मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गरज… — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ गरज… — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

एका मैत्रिणीच्या आईचे परवा 95 व्या वर्षी निधन झाले. वडील आधीच निवर्तले होते. 65 वर्षांच्या त्यांचा सहजीवनातला संसार आणि विस्तार म्हणजे तीन लेकी, दोन लेक, आठदहा खोल्यांचा प्रशस्त बंगला, प्रत्येकाचे स्वतंत्र शयनकक्ष, कपाटे, तेवढे कपडे, कार्यप्रसंगी 100 माणसे जेवू शकतील एवढी भांडी, फर्निचर, बाग, हौसेमौजेने तीर्थयात्रा, पर्यटन करून आणलेल्या शोभेच्या वस्तू, प्रचंड माळे, आधीच्या दोन पिढ्यांचे ऐवज, वस्तू, सामान…पण आता सर्व मुलेबाळे स्वतंत्र व स्वतःच्या कार्यक्षेत्रांत मग्न, यशस्वी व अत्यंत व्यस्त जीवनक्रम असलेली !

आईपश्चात वर्षभर रिकामे, प्रचंड घर आवरायला कुठून सुरुवात करावी हा यक्षप्रश्नच !!

कपाटातल्या पाचशेच्या वर साड्या आता कुणीही घेऊ इच्छित नाही, 100 माणसांच्या स्वयंपाकाची घरात कुणीही उस्तवार आता करणार नाही, जुने अवाढव्य फर्निचर आता कुणाच्याच घरात मावणार नाही, शोभेच्या वस्तूंकडे निगराणी करण्यास वेळ नाही, मोठाले खरे दागिने बाळगून किंवा घालून मिरवणे सुरक्षित नाही, बाग मेंटेन करायला मनुष्यबळ नाही, अडगळी साफ करायला कष्टांची शारीरिक क्षमता नाही…असे अनेक नकार व फुल्या मारल्यावर मग जेवढे चांगले व शक्य तेवढे गरजू संस्था व संसार असलेल्या लोकांना देण्यात आले, आठवण म्हणून आईची एक साडी घेण्यात आली. असे करता करता त्या घराची सात दशकांची घडी मिटवण्यात आली !

या उस्तवारीत प्रचंड मनस्ताप, कठोर निर्णय, नकार, उस्तवार आणि शारीरिक व मानसिक कष्ट तसेच थकवा आणि ताण मुलांना सोसावा लागला. या सगळ्यांपेक्षा सर्वाधिक मौल्यवान असा त्यांचा वैयक्तिक वेळ त्यांना वाया गेल्याची भावना निर्माण झाली. ज्या पिढीने हे सगळे जमवण्याचा अट्टाहास करण्यासाठी कष्ट झेलले ती पिढी काळाच्या पडद्याआड गेली. हे सर्व सांगतांना ‘ती’ मैत्रीण खरेच दुःखी, खिन्न व अंतर्मुख झाली होती.

यातून काही बोध घ्यावा असे वाटले तो म्हणजे…

१) गरजा कमी हीच आनंदाची हमी.

२) घर हे माणसांचे वसतिस्थान आहे, वस्तूंची अडगळ नव्हे.

३) आपल्यासाठी वस्तू आहेत, वस्तूंसाठी आपण नाही… नाहीतर अवघे आयुष्य साफसफाई करण्यात आणि वस्तू राखण्यात जाते.

४) प्रवासात फक्त सुंदर क्षणांचा संचय करा, शोभेच्या वस्तूंचा नव्हे.

५) जितकी अडगळ कमी तेवढा तुमचा आत्मशोध सुलभ.

६) विकत घ्यायच्या आधी ‘का’, ‘कशाला’, ‘हवेच का ?’चा माप दंड लावावा.

७) साधेपणा, सुसंगतता आणि सुयोजकता हे नियम पाळावेत.

८) दान हे संचय करण्यापेक्षा कधीही श्रेष्ठच मानावे.

९) आजचा संचय उद्याची अडगळ.

१०) दुसऱ्यांना प्रभावित करण्यासाठी स्वतःच्या कष्टाचे पैसे अजिबात खर्चू नयेत.

११) जेवढ्या वस्तू कमी तितके घर मोकळा श्वास घेते, माणसे शांत व समाधानी असतात, मानसिक विकार व नैराश्य येत नाही.

१२) सुटसुटीत, मोकळे घर म्हणजे पैशाची, मनुष्यबळ ऊर्जेची व वेळेची बचतच.

हा वेळ तुम्ही परस्पर मानवी संबंध, सुसंवाद, छंद जोपासणे, व्यायाम, आरोग्य सुधारणे यासाठी देऊ शकता.

१३) किमान गरजा ही lजीवनशैली काळानुसार अत्यावश्यक गरज ठरणार आहे.

१४) शाश्वत सुखाचा राजमार्ग हा ‘समाधान’ नावाच्या गावातूनच जात असतो.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ न्यूट्रल थिंकिंग… लेखिका : डॉ. स्वाती गानू ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ न्यूट्रल थिंकिंग… लेखिका : डॉ. स्वाती गानू ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

‘There are always flowers who want to see them’ असं म्हणतात. आठ दिवसांपूर्वी जेव्हा बारा वर्षांचा सारंग खोली न आवरता, आलेल्या मित्रांशी बोलत होता तेव्हा त्याच्या अव्यवस्थितपणाचा आईला खूप राग आला होता.तो मात्र अनभिज्ञ होता यापासून. आपलं त्या विषयावरचं मत मुद्देसूदपणे पटवून देत होता मित्रांना.ती टक लावून त्याच्याकडे पाहत होती अगदी न्यूट्रल होऊन.जणू तो अनोळखी होता. तिला वाटलं आपल्या माणसाकडे असं न्यूट्रल होऊन पाहण्यात काही वेगळंच फीलिंग आहे.आपण नेहमी हक्काने ‘तुझं कसं चुकलंय,तू हे असं बोलायला हवं होतंस,अशा पद्धतीने करायला पाहिजे होतं,या प्रकारे वागायला हवं होतं,’ असं सहज बोलून जातो,अपेक्षा करतो.जजमेंटल होतो.लेबलिंग करुन मोकळं होतो.आज जेव्हा आईने आपल्याच मुलाबद्दल वेगळा विचार केला, तेव्हा तिला सारंगची चांगली बाजूही दिसली.असं न्यूट्रल होऊन बघण्यात एक वेगळीच मजा आली.ताटावर बसल्या क्षणी पहिल्याच घासाला ‘काय केलंय आज भाजीचं, बघू या’ म्हणणारे सासरे त्यांच्या असिस्टंटला पत्राचा मसुदा सांगताना आई परत न्यूट्रल झाली आणि ऐकू लागली. त्यांची कायद्यातील जाण,ज्ञान, त्यांचं ड्राफ्टिंग पाहून ती थक्कच झाली.मोठी मुलगी अरुणिमा, चहाचा मग तासनतास थंड करुन पिते आणि तो स्वयंपाकघरात आणायला विसरते,कधी कधीतर तो तिच्या कपाटात सापडतो.आईला भयंकर संताप येतो. संध्याकाळी ती जेव्हा चित्रा सिंगची गझल गात होती, तेव्हा तिच्या सुरातली आर्तता मनाला भिडून गेली.नवरोबा सलील त्याला ओपन डोअर सिन्ड्रोमच आहे.सगळ्या खोल्यांचे, कपाटाचे दरवाजे नेहमी उघडे ठेवतो.याचं काय करावं?नुसती चिडचिड होते.त्याची ऑनलाईन काॅन्फरन्स सुरु होती.युरोपियन स्टुडंट्ससमोर बिहेवियरल थेरपीचं त्याचं विश्लेषण कमाल होतं.पुन्हा ती न्यूट्रल झाली. तिला ओपन डोअर सिन्ड्रोमचं हसू आलं.तिने आणलेल्या भाजीला नावं ठेवणा-या सासूबाईंचं कुठली भाजी आणल्यावर समाधान होईल, या विचाराने ती वैतागून जायची. पण गीतेचा भावार्थ समजावताना तिला त्या गार्गी,मैत्रेयीच वाटायच्या.आज हा नवाच खेळ ती आपल्या मनाशी खेळली.

आपल्या माणसांबरोबर आपण दिवस रात्र, चोवीस तास असतो,मित्रमैत्रिणींबरोबर ,नातेवाईकांबरोबर कधीकधी वेळ घालवतो.लक्ष बहुतेकवेळा निगेटिव्ह गोष्टी दोष,वीक एरियांजवर चटकन जातं.’घर की मुर्गी दाल बराबर ‘ या उक्ती प्रमाणे आपण घरच्यांबद्दल विचार करताना प्रेज्युडाईज अर्थात पूर्वग्रहदूषित दृष्टीने पाहत असतो.ते अगदी ऑबव्हियस आहे. कारण तुम्हाला रोज त्यांच्याशी डील करावं लागतं.पण न्यूट्रल होऊन या नात्यांकडे पाहिलं, तर नवं असं काही सापडायला लागतं.प्रत्येकात त्याचं स्वतःचं असं काही युनिक असतंच. फक्त ते आपल्याला शोधता यायला हवं.ही विजन जाणीवपूर्वक तयार करावी लागते.एखादी व्यक्ती आपल्याला खटकते, ते खरं म्हणजे त्या व्यक्तीबद्दलचा राग नसतो, तर त्या व्यक्तीच्या सवयी,वृत्ती,स्वभावाचा तो राग येत असतो. पण हे आपल्या लक्षात येत नाही.म्हणूनच न्यूट्रल होऊन माणसांकडे अधूनमधून पाहिलं, की ‘दूध का दूध और पानी का पानी ‘ दिसायला लागतं.हे परस्पेक्टिव्ह एक आणखी गोष्ट तयार करते ती म्हणजे स्वतःकडे पाहण्याचा न्यूट्रल दृष्टिकोन.तुम्हाला वाटतं की मी सर्वगुणसंपन्न. माझं कधी काही चुकतच नाही.पण हा न्यूट्रल गेम स्वतःशी खेळताना आपले आपणच सापडायला लागतो.ते ॲक्सेप्ट करणं, स्वतःकडे असं पाहता येणं हे जमायला हवं.स्वतःच्या गुणदोषांचा असा त्रयस्थ म्हणून विचार करता येणं हे विवेकाचं लक्षण आहे.

नाती गुंतागुंतीची असतात.ती सांभाळणं तारेवरची कसरत असते.अशावेळेस न्यूट्रल गेम  खेळलो म्हणजेच त्रयस्थ होऊन व्यक्ती, वस्तू,नाती,

परिस्थिती,प्रसंग यांच्याकडे पाहणं यातून आपलीच माणसं आपल्याला कळायला लागतात.शिवाय आपला दृष्टिकोनही बदलायला लागतो.आपण मॅच्युअर्ड होतो.माणूूस म्हणून समृद्ध होण्याची प्रक्रिया यातूनच पुढे जात असते.पॅाझिटिव्ह थिंकिंग, निगेटिव्ह थिंकिंग यासारखाच तिसरा प्रकार आहे न्यूट्रल थिंकिंग. जे असतं जजमेंटल फ्री, रॅशनल, चांगल्या गोष्टींवर फोकस करायला शिकवणारं .कोच हे प्लेअर्सकरता, बिझिनेसमन हे एम्प्लॉईजकरता वापरतात आणि त्यातून जर त्यांचा परफॅार्मन्स सुधारत असेल तर आपण हा प्रयत्न जरूर करुन पहायला मुळीच हरकत नाही.

I think one can enjoy this Neutral Thinking Game and understand other persons better!

लेखिका:डॉ. स्वाती गानू

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ समज – गैरसमज… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

समज  गैरसमज… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम 

तहानभुकेने अगदी व्याकुळ,घामाने चिंब झालेले तुम्ही  बऱ्यापैकी सावली असलेलं  झाड शोधून आसपास कुठे पाणी मिळतंय का,हे बघताय तेवढ्यात समोरच्या बिल्डिंगमधल्या खिडकीत उभ्या असलेल्या व्यक्तीकडे तुमचं लक्ष जातं आणि ती व्यक्ती तुम्हाला ‘पाणी हवंय का?’ विचारते.

त्या क्षणी तुम्हाला काय वाटेल ? त्या व्यक्तीबद्दल तुमचं मत काय होईल ?

ती व्यक्ती मग  खिडकी बंद करून तुम्हाला बिल्डिंगच्या खाली यायचा इशारा करते, तुम्ही लगबगीने तिथे जाता पण नंतरची १५ मिनिटं तिथे कोणीही येत नाही !

आता तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल  काय वाटेल?

हे तुमचं दुसरं मत असणार आहे.

थोड्या वेळाने ती व्यक्ती तिथे येते आणि म्हणते, “सॉरी!मला जरा उशीर झाला; पण तुमची अवस्था बघून, मी तुम्हाला नुसत्याच  पाण्याऐवजी लिंबू पाणी आणलं आहे !”

आता तुमचं त्या व्यक्तीबद्दल मत काय आहे ?

तुम्ही एक घोट सरबत घेता आणि तुमच्या लक्षात येतं की अरे, ह्यात साखर अजिबातच नाहीये !

आता तुमचं त्या व्यक्तीबद्दल काय मत होईल?

तुमचा आंबट झालेला चेहरा पाहून ती व्यक्ती खिशातून हळूच एक साखरेचा छोटा पाऊच काढते आणि म्हणते

“तुम्हाला चालत असेल, नसेल आणि किती कमी- जास्त गोड आवडत असेल हा विचार करून मी मुद्दामच आधी साखर घातली नाहीये.”

आता तुमचं त्या व्यक्तीबद्दल काय मत झालं आहे ?

मग विचार करा :अवघ्या १५ -२० मिनिटात तुम्हाला तुमची मतं , तुमचे आडाखे भरभर बदलावे लागतायत. अगदीच सामान्यातल्या सामान्य परिस्थितीत क्षणात आपले विचार, आपली मतं तद्दन चुकीची ठरू शकतात, तर मग कोणाबद्दल फारशी काहीच माहिती नसताना, ती व्यक्ती पुढे कशी वागणार आहे, हे माहीत नसताना, केवळ वरवर पाहून, त्याबद्दल चुकीची समजूत करून घेणं योग्य आहे का ? जर नाही, तर एखाद्या बद्दल गैरसमज करून घेण्यापेक्षा त्या व्यक्तीला समजून घेणं योग्य नाही का ?

असं आहे की जोपर्यंत कोणी तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागतंय तोपर्यंतच ते चांगले असतात, नाहीतर वाईट ? गैरसमज फार वाईट परिणाम करणारे ठरतात. तेव्हा एकमेकांना समजून घ्या.म्हणजे जीवनात समस्या निर्माण होणार नाहीत.

मत बनवताना घाई करु नये.

लेखक – अज्ञात 

संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मनातल्या मनातले श्लोक…कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ मनातल्या मनातले श्लोक… – लेखक  – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

 जगी सर्व सुखी असा तोच आहे |

नशीबी जयाच्या गाढ झोप आहे ||

ज्यांच्यावर ईश्वराची कृपादृष्टी होते |

त्यांचेच सकाळी पोट साफ होते ||

पहिला चहा रोज मिळावा आयता |

अनंता तुला मागणे हेचि आता ||

आज कुठली भाजी व आमटी करावी |

रोज रोज मला याची काळजी नसावी ||

कृपा मजवरी नित्य तुझी असावी |

कामाला ‘बाई’ देवा चांगली मिळावी ||

वाटेल तेव्हा मी वाट्टेल ते खावे |

वजन माझे किंचित तरी ना वाढावे ||

मनावाटे तेव्हा शॉपिंग करावी |

कुठलीही ऑफर कधी ना सोडावी ||

सदा सर्वदा ‘मन’ प्रसन्न रहावे |

कितीही राग आला तरी ना चिडावे ||

वय माझे कितीही वाढत रहावे |

परी बालपण थोडे टिकून रहावे ||

नको रे मना काळजी ती कशाची |

मला दे कला आनंदी राहण्याची ||

कवी : अज्ञात 

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वहातूक… पूर्वीची आणि आजची… लेखक – श्री विद्याधर शेणोलीकर ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?इंद्रधनुष्य?

 ☆ वहातूक… पूर्वीची आणि आजची… लेखक – श्री विद्याधर शेणोलीकर ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆ 

आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सहज पुणे शहरातून स्कूटरवर फेरफटका मारला आणि मोकळ्या रस्त्यांवरून जाताना एकदम  ३५-४० वर्षांपूर्वीचा “फील” आला. 

कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, विद्यापीठ रस्ता, पुणे-सातारा रस्ता, सिंहगड रस्ता वगैरे रस्त्यांवर दाट झाडी होती. हे रस्ते निवांत होते. अगदी रात्री १०-१०.३० नंतर तर लक्ष्मी रोडही  निवांत असे. चक्क बंद दुकानांच्या पायऱ्यांवर बसून रात्री गप्पागोष्टी करता येत. लक्ष्मी रोडला एक चहाचं दुकान रात्रीही चालू असे. तिथे बहुधा कामावरून परतणारे, थकलेभागलेले कामगार चहा पीत. रात्री उशीरापर्यंत इराणी हॉटेले चालू असत आणि पहाटे लवकर उघडत. रात्रीच्या शो ला सिनेमा बघून येताना गुडलक, रीगल, सनराईझ, पॅराडाईज, लकी, नाझ वगैरे ठिकाणी किंचित विसावून चहा घेण्यात मजा होती. क्वचित् खोबरं लावलेला केक नाहीतर क्रीमरोल, नाहीतर बन-मस्का खाऊन पोटोबा शांत केला जाई. रात्री पुण्यात रस्त्यावरून भरभर जाणारे म्हणजे एकतर सिनेमा पाहून परतणारे किंवा कामावरून घरी परतणारे असत. माझे वडीलही हाय‌ एक्स्प्लोझिवज् फॅक्टरीमध्ये खडकीला नोकरीला होते. सेकंड शिफ्ट संपल्यावर एच. ई.तसेच अम्युनिशन फॅक्टरीमधले कामगार एकमेकांच्या सोबतीने खडकी ते फर्ग्युसन रस्ता असा प्रवास अपरात्री करत. अपरात्री सहकारनगर, अरण्येश्वर, पौड फाटा वगैरे भागात यायला रिक्षावाले नाखूष असत ( ही फॅशन जुनी आहे , आजची नाही…). अपरात्री एकट्यादुकट्याला सायकल मारत जायला भीती वाटायची. त्यात जोशी-अभ्यंकर खून प्रकरण झाल्यावर तर अख्ख्या पुणे शहरातच दहशत पसरली होती. पुढेही  “हाकामारी” वगैरे अफवांमुळे भीती वाटायची. 

पुणं हे सायकलींचं शहर तर होतंच, पण नंतरही अनेक वर्षं बजाज सुपर, कब, एम एटी हीच वाहनं होती. त्यापूर्वी तर लूना, व्हेस्पा आणि लॅंब्रेटा ही वाहनं. मोटारीही मुख्यत्वे एम्बॅसिडर आणि फियाट याच होत्या, क्वचित् प्रीमियर पद्मिनी… बाकी भारी गाड्या फक्त इंग्रजी चित्रपटात पडद्यावरच दिसत. रात्री पुण्यातले बहुतेक रस्ते अजगरासारखे शांत, सुस्त पहुडलेले असायचे आणि दिवसाढवळ्याही दुतर्फा वाहतूक असून रस्ते “मोकळे” वाटायचे. आतासारखी वाहतूक “अंगावर” येत नव्हती. मुख्य  म्हणजे सायलेन्सर काढून ट्रिपल सीट जात, माकडासारख्या आरोळ्या ठोकत जायचं आणि सिग्नलला पच्च् करून तोंडातला गुटख्याचा  तोबरा थुंकायचा…. हा जंगली प्रकार नव्हता. 

तेव्हाची वाहतूक आठवली, की त्या आठवणीनं मन गलबलून येतं…

त्याकाळची वाहतूकही त्याकाळच्या पुण्यासारखीच होती…..

शांत…. सभ्य……सौम्य…..!!!

लेखक :  श्री विद्याधर शेणोलीकर

कोथरूड,  पुणे.

संग्राहक : श्री माधव केळकर. 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “दीपावली” लेखक :श्री अप्पा पाध्ये गोळवलकर ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “दीपावली” लेखक :श्री अप्पा पाध्ये गोळवलकर ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

दसरा संपला होता. दीपावली जवळ आली होती. तेवढ्यात एके दिवशी काही तरुण-तरुणींचा NGO छाप कंपू आमच्या महाविद्यालयात  शिरला.

त्यांनी विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले; परंतु त्यांच्या एका प्रश्नावर सगळे महाविद्यालयीन विद्यार्थी चूप बसले. त्यांना काहीही उत्तर सुचेना. अवघ्या कॉलेजमध्ये शांतता पसरली!

त्यांनी विचारलं, “जर का दीपावली हा सण भगवान रामचंद्रांच्या १४ वर्षांच्या वनवासानंतर ते अयोध्येला परतण्याचा उत्सव म्हणून साजरा केला जातो, तर मग दीपावलीच्या दिवशी  ‘लक्ष्मी पूजन’ का केलं जातं ? श्रीरामाची पूजा का नाही केली जात?”

या प्रश्नावर कॉलेजमध्ये अचानक शांतता पसरली. कारण त्या काळामध्ये न कुठला सोशल मीडिया उपलब्ध होता, न कुठले स्मार्टफोन्स उपलब्ध होते! कुणालाच या प्रश्नाचं उत्तर माहीत नव्हतं! तेवढ्यात, शांततेचा भंग करत आमच्याच विद्यार्थ्यांमधील एक हात या प्रश्नाचं उत्तर द्यायला वर झाला!

त्याला बोलायला सांगितल्यावर त्या विद्यार्थ्यानं उत्तर दिलं, “दीपावली हा सण दोन युगांशी म्हणजेच ‘सत्ययुग’ आणि ‘त्रेतायुग’ यांच्याशी जोडलेला आहे!

सत्ययुगात समुद्र मंथनातून माता लक्ष्मी याच दिवशी प्रकट झाली होती! म्हणून ‘लक्ष्मी पूजन’ केलं जातं!

भगवान श्री रामसुद्धा त्रेता युगात याच दिवशी अयोध्येला परतले होते! त्यावेळी अयोध्यावासियांनी लक्षावधी दीप प्रज्वलित करून आपल्या भगवंताचं स्वागत केलं होतं! म्हणूनच या सणाचं नाव दीपावली असं आहे!

म्हणूनच या पर्वाची दोन  नावे आहेत, ‘लक्ष्मी पूजन’ हे सत्ययुगाशी संबंधित आहे, आणि दुसरं “दीपावली” हे त्रेता युगातील प्रभु श्रीराम आणि दिव्यांची आरास याच्याशी संबंधित आहे!

हे उत्तर मिळाल्यानंतर थोडावेळ पुन्हा सगळीकडे शांतता पसरली, कारण कुणालाच या उत्तराला खोडून काढता येत नव्हतं! अगदी आम्हाला हा प्रश्न विचारणाऱ्या त्या तरुण-तरुणीच्या चमूलादेखील यावर काय बोलावं हे कळेना!

आणि मग आम्हा सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एकदमच टाळ्यांचा कडकडाट केला!

एका वृत्तपत्राने माझी मुलाखत देखील घेतली!

त्या काळामध्ये वृत्तपत्रांमध्ये मुलाखत द्यायला मिळणं हेच मोठं अप्रूप होतं!

पुढे कित्येक वर्षानंतर समजलं की तो जो तरुण तरुणींचा कंपू आमच्या कॉलेजमध्ये प्रश्न विचारायला आला होता तो, ज्यांना आजच्या आधुनिक शब्दावलीत  “लिबरर्ल्स” (वामपंथी) म्हटलं जातं,त्यांनी पाठवलेला होता. ही वामपंथियांची चमू प्रत्येक कॉलेजात जाऊन कॉलेज तरुणांच्या डोक्यात ही गोष्ट भरवत असे की “जर दीपावली ही श्रीरामाशी संबंधित आहे तर मग दीपावलीच्या सणात ‘लक्ष्मीपूजना’चं औचित्य काय आहे?” एकूणच ही वामपंथी चमू विद्यार्थ्यांचं ब्रेनवॉश करीत होती !

परंतु आमचं उत्तर मिळाल्यानंतर ती चमू गायबच झाली!

एक आणखीन प्रश्न विचारण्यात आला होता आणि आजही विचारण्यात येऊ शकतो. तो म्हणजे लक्ष्मी आणि श्री गणपती यांचं आपसात काय नातं आहे ? आणि दीपावली मध्ये या दोघांचं पूजन का केलं जातं?

याचं खरं उत्तर पुढीलप्रमाणे :

लक्ष्मी जेव्हा सागरमंथनामध्ये सागरातून वर आली आणि तिनं भगवान विष्णूशी विवाह केला तेव्हा ती सृष्टीच्या धनाची आणि ऐश्वर्याची देवी बनली! तेव्हा माता लक्ष्मीने धन वाटून देण्यासाठी कुबेराला या धनाच्या भांडाराचा व्यवस्थापक म्हणून नेमलं.

कुबेराची वृत्ती कंजूषपणाची होती. तो धन वाटण्यापेक्षा केवळ त्याचं रक्षण तेवढं करू लागला!

इकडे माता लक्ष्मी त्रासून गेली! तिच्या भक्तांना लक्ष्मीचं धन प्राप्त होत नव्हतं. धनाच्या रूपानं त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा होत नव्हती!

लक्ष्मीनं आपलं गाऱ्हाणं भगवान श्री विष्णूंसमोर मांडलं! भगवान विष्णु लक्ष्मीला म्हणाले, “तू कुबेराच्या जागी रक्षक म्हणून दुसऱ्या कुणाचीतरी नेमणूक कर!”

लक्ष्मी म्हणाली, “यक्षराज कुबेर माझा परम भक्त आहे! त्याला वाईट वाटेल!”

तेव्हा भगवान विष्णुंनी लक्ष्मीला सांगितलं तू श्री गणपतीच्या दीर्घ आणि विशाल बुद्धीचा त्यासाठी वापर कर!

मग लक्ष्मीनं श्री गणपतीला सांगितलं की “कुबेर धनभांडारातील धनाच्या रक्षणाचं कार्य करील आणि तू धनाच्या भांडारातलं धन भक्तांना वाटून द्यायचं काम करावंस!”

श्री गणपती तर महा बुद्धिमान! तो म्हणाला, “देवी, मी ज्याचं नाव तुला सांगेन त्याच्यावर तू कृपा कर! त्यासाठी तू मला विरोध करायचा नाहीस!”

लक्ष्मीनं गणपतीची ही मागणी मान्य केली!

तेव्हापासून श्री गणेश लोकांच्या भाग्यातील विघ्न / अडचणी यांचं निवारण करण्यासाठी त्यांच्यासाठी धनभंडाराचे दार उघडू लागले! कुबेराकडे केवळ धन-भंडारावर पहारा करण्याचंच काम शिल्लक राहिलं.

गणपतीची उदार बुद्धी बघून, लक्ष्मीनं आपला मानसपुत्र असलेला गणेश याला अशी विनंती केली की ज्या ठिकाणी ती आपला पती श्री विष्णू यांचेसोबत नसेल तेव्हा पुत्रवत असलेला श्री गणेश तिच्या सोबत असेल!

दीपावलीत लक्ष्मीपूजन असतं कार्तिक अमावस्येला! भगवान विष्णू त्या समयी योगनिद्रेत असतात! या दिवसाच्या नंतर अकरा दिवसांनी श्री विष्णू प्रबोधिनी एकादशीला निद्रेतून जागे होतात!

लक्ष्मीला नेमकं याच काळादरम्यान पृथ्वीभ्रमण करण्यासाठी म्हणजेच शरद पौर्णिमा ते दीपावली या काळात यायचं असतं. आणि या काळात श्रीविष्णू सोबत नसल्यानं ती गणेशाला आपल्या सोबत घेऊन येते. म्हणूनच दीपावलीला लक्ष्मी-गणेश यांची पूजा केली जाते!

(पहा कसा विरोधाभास आहे की या देशातला आणि हिंदूंचा सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळी ह्या सणाबद्दल पाठ्यपुस्तकात कुठलीही विस्तृत माहिती आढळून येत नाही आणि जी काही माहिती आहे तीही अत्यंत त्रोटक स्वरूपात आहे!)

व्हाट्स ॲप साभार –

लेखक : श्री.अप्पा पाध्ये गोळवलकर

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “जीभ…” – लेखक : श्री चंद्रकांत जोशी ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “जीभ…” – लेखक : श्री चंद्रकांत जोशी काका ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

जेणे जिंकीली रसना ।

तृप्त जयाची वासना ।

जयास नाही कामना ।

तो सत्वगुण ।

…समर्थ रामदास

ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण, असा एकमेव अवयव म्हणजे जीभ ! रसनेंद्रिय आणि वाक् इंद्रिय ! चव घेणे आणि बोलणे. एकाची प्रवृत्ती बाहेरून आत स्विकारण्याची तर एकाची आतून बाहेर पडण्याची ! एकाच वेळी असं आत बाहेर काम करण्याचे सामर्थ्य असलेला द्वैत अवयव म्हणजे जीभ.

एकाच अवयवावर ताबा मिळवला तर ज्ञान आणि कर्म या उभय प्रवृत्तींना जिंकता येणे सहज शक्य आहे, असा एकमेवाद्वितीय अवयव म्हणजे जीभ.

सर्वात जास्त रक्तपुरवठा असणारा हा रसमय अवयव जीभ ! तोंडात आलेला घास घोळवत घोळवत, इकडे तिकडे फिरवत फिरवत, बत्तीशीच्या ताब्यात देत देत, त्यांच्याकडून बारीक पीठ करवून, तयार लगद्याला आतमध्ये ढकलण्याचे महत्त्वाचे काम करणारा अवयव म्हणजे जीभ.

प्रत्येक पदार्थाची चव वेगवेगळ्या ठिकाणी वेगळेपणाने ओळखता येणारी, ही आगळीवेगळी जीभ. भातातून नजर चुकुवून येणारा दगड शोधून काढतेच, पण डोळ्यांना सहजपणे न दिसणारा, अगदी दाताच्या फटीत लपून बसलेला केसही शोधून काढते. ही सीआयडीची दृष्टी असलेला हा कलंदर अवयव म्हणजे जीभ !

सतत बत्तीस दातांच्या संरक्षणात फिरणारा, पण चुकून मनात आणलं तर चुकीच्या क्षणी, चुकीचा शब्द, चुकीच्या व्यक्तीसमोर बोलून, बत्तीसच्या बत्तीस दात हातात काढून दाखवण्याचे सामर्थ्य असलेला एक चमत्कारिक अवयव म्हणजे जीभ !

बेधुंदपणे अखंड बडबडण्याचे प्रमुख काम करणारा आणि अन्नाला फावल्या वेळात पाठीमागे ढकलण्याचे काम करणारा, पण हे “काम” करताना, कधीही न दिसणारा अवयव म्हणजे जीभ ! दिसतो तो फक्त “आऽऽ कर” असं म्हटल्यावर.थोडाच वेळ दर्शन देणारा अवयव म्हणजे जीभ ! काम करताना मात्र कधीही दिसत नाही, असा “कामानिराळा” राहणारा हा बिलंदर अवयव जीभ !

दाताशी युती करत तथदध, ओठाशी युती करत पफबभ, दंतमूलाशी युती करत चछजझ, टाळूशी युती करत टठडढ, अशा अनेक युत्या, युक्तीने करत ध्वनी निर्मितीत सहाय्य करणारा युतीबाज अवयव म्हणजे जीभ !

पोटात काय चाललंय, याची बित्तंबातमी बाहेर डॉक्टरांना दाखवणारा, तोंडात बसवलेला पण पोटाचा जणु काही सीसीटीव्हीच असलेला एक अवलिया अवयव म्हणजे जीभ!

ओठाबाहेरील जगाला वेडावून दाखवून, आपल्या आतल्या मनाचं, तात्पुरते का होईना, समाधान करून देणारा, हा एक हुश्शार अवयव म्हणजे जीभ !

ज्या एका अवयवाला ताब्यात ठेवले तर शंभर वर्षापर्यंत सहज जगता येईल, अशी दिव्य अनुभूती देणारा एक योगी अवयव म्हणजे जीभ !

आजारी पडेपर्यंत खाणाऱ्यांनी बरे होईपर्यंत उपवास करावा, असा संयम शिकणारा एकमेव अवयव म्हणजे जीभ !

तिला जर भगवंताच्या नामात अडकवले तर नराचा नारायण करण्याची ताकद असणारा एकमेव अवयव म्हणजे जीभ.

उगाच नाही म्हटलंय, जेणे जिंकिली रसना……

त्याची जिरोनी गेली वासना….

लेखक :श्री.चंद्रकांत जोशी काका, ठाणे

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चला मिळवून आणू या… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ चला मिळवून आणू या… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

“करंजीच्या सारणात थोडी कणीक भाजून घालावी. म्हणजे मग सारण नीट मिळून येतं. नाहीतर करंजीचा खुळखुळा होतो. ” लहानपणी आईकडून हमखास ही टीप मिळायची. “पण कणीकच का? तांदळाचे पीठ का नाही?” तर त्यावर “अग, गव्हाच्या पिठाच्या अंगी सगळ्यांना धरून ठेवण्याचा गुणधर्म असतो. तसं तांदळाच्या पीठाचे नाही. ते अगदी सरसरीत असतं. “

“मग आपण खव्याच्या किंवा मटारच्या करंजीत का नाही घालत हे गव्हाचे पीठ?” माझा अजून एक आगाऊ प्रश्न. तर त्यावर “अग, मटार किंवा खव्याच्या सारणात मूळचा ओलावा असतो. त्याला मिळून आणण्यासाठी दुसऱ्या घटकाची आवश्यकता नसते”  – तितकेच शांत, पण तत्पर उत्तर.

अगदी सहजपणे माझ्या आईने  जीवनातल्या दोन गोष्टी मला समजावल्या.

१. अंगी ओलावा असेल, तर गोष्टी मिळून येतात.

२. ओलावा कमी असेल, तर मिळून आणणारा घटक आवश्यक ठरतो.

नंतर लग्न झाल्यावर वडे, कटलेट इत्यादी रेसिपी करताना binding factor चे महत्व पटत गेले. आणि आता दिवाळीसाठी करंज्या करत असताना एक गोष्ट लख्ख जाणवली.

नात्यांचंही असंच आहे. प्रत्येक नातेवाइकांच्या गोतावळ्यात असा एखादा binding factor असतो, जो सर्वाना धरून ठेवतो. मग ते असे मित्र/ मैत्रीण असतील, जे बऱ्याच वर्षांनी कारणपरत्वे दुरावलेल्या सगळ्यांना एकत्र आणतात.

व्हॉट्सॲप ग्रुप बनवतात आणि “contact मध्ये रहायचं हं” अशी प्रेमळ दमदाटीही करतात. कधीकधी असा binding factor आपल्या नात्यातील एखादी बुजुर्ग व्यक्ती असते, तर कधी आपल्या शेजारी पाजारीही अशी व्यक्ती सापडून जाते.

आजच्या virtual जगात सुद्धा असे binding factors दिसतात. आपण त्याना अनेकदा भेटलेलोही नसतो… पण ते मात्र आपली चौकशी करतात. काळजीही करतात.

अशा सगळ्या binding factors ना माझा मानाचा मुजरा. ते आहेत, म्हणून समाजातील माणूसपण टिकून आहे, अन्यथा समाजाचाही खुळखुळा व्हायला वेळ लागणार नाही.

मंडळी, आपण वयाने मोठे झालो, मिळवते झालो, चला तर – आता मिळवून आणणारे होऊ या.

प्रस्तुती : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “खरंच का फक्त भाव महत्त्वाचा?…” – लेखिका : डॉ. शिल्पा जोशी क्षीरसागर ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “खरंच का फक्त भाव महत्त्वाचा?…” – लेखिका : डॉ. शिल्पा जोशी क्षीरसागर ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

” हे बघा आई, मी बिझी आहे. उद्या मला मिटींग्स आहेत.एवढा काही वेळ नाही मला, मी कुमारिकेच्या घरी अथर्व बरोबर बांगड्या , फ्रॉक पाठवून देईन,” सायली म्हणाली .

” अगं, संध्याकाळी बोलवू ना पण मग तिला. नीट पूजा करू, तुझ्या वेळेनुसार बोलवू, ” सासूबाई म्हणाल्या .

” आई , अहो, भाव महत्त्वाचा !  पूजा केली काय आणि नाही केली काय.संध्याकाळी कंटाळा येतो खूप, ” सायलीने चप्पल घालता घालता म्हटलं.

” सायली , दोन मिनिटं बोलू ? वेळ आहे आता? “

कपाळावर आठ्या आणत सायलीने होकार दिला. सासूबाई म्हणाल्या, ” शिरीष, तू पण ऐक रे . भावच सगळ्यात महत्त्वाचा ह्यात दुमत नाहीच. पण भाव  ह्या गोंडस नावाखाली आपण आपल्या जबाबदाऱ्या , कर्तव्य विसरतोय, असं नाही वाटत का तुला ? तू सून आहेस म्हणून नाही, शिरीषलासुद्धा मी हेच विचारते आहे . देवधर्म म्हणजे अंधश्रद्धा नाही, पण वेळेचा अपव्यय, असं तुम्हाला वाटतं ना ? गणपतीत रोज रात्री वेगवेगळ्या स्पर्धा असतात. तेव्हा उत्साहाने भाग घेता तुम्ही, पण गणपतीला दुर्वा तोडून आणा म्हटलं की तुम्हाला वेळ नसतो , थकलेले असता. घरच्या आरतीलाही चार वेळा ‘या रे’ म्हणावं लागतं. कुठलाही उपास म्हटलं की मला झेपत नाही , माझा विश्वास नाही, असं म्हणून मोकळे होता. पण ते कोणतं किटो डाएट का काय त्याला तयार होता…”

सायली म्हणाली ,  “आई , तुम्ही दोन वेगळ्या गोष्टी compare करताय.”

” नाही , माझं ऐकून घे पूर्ण . अरे, उपास तापास , देवधर्म म्हणजे स्वतःच्या मनाला , शरीराला लावून घेतलेलं बंधन . हे unproductive आहे, असा तुम्ही गैरसमज करून घेतलाय . आहेत , बऱ्याच प्रथा अशाही आहेत की त्यात तथ्य नाही , मग त्या सोडून द्या किंवा थोड्या बदला. आता सायली, तुला म्हटलं, आजेपाडव्याला तुझ्या बाबांचं श्राद्ध घाल , तू म्हणालीस, भाव महत्त्वाचा. मी त्यांच्या नावाने दान देईन.अगं, दे ना तू दान. पण त्यांच्या फोटोला हार घालून त्यांच्या आठवणीत त्यांच्या आवडीचे पदार्थ करशील, अथर्वला सांगशील- आजोबांना नमस्कार कर , तुझ्या कळत नकळत त्यांच्या आठवणी त्याला सांगशील तर त्यालाही कळेल की आईला घडवण्यासाठी त्या आजोबांनी कष्ट घेतलेत, त्यांचाही आदर करावा. पण तुम्हाला भाव महत्त्वाचा, ह्या पांघरुणाखाली लपत कामं करायचा कंटाळा असतो . उद्या अथर्व तुला, मला , शिरीषला कुमारिकेची पूजा करताना बघेल, तर स्रियांबद्दलचा आदर त्याला वेगळा शिकवावा लागेल का ? गिफ्ट तर काय देतच असतो गं आपण तिला . परवाचंच घे , घरी भजन आहे, म्हटल्यावर तू नाक मुरडलंस , वेळ नाही म्हणालीस पण घरी परत आलीस तेव्हा आमचं भजन सुरू होतं, त्यात रंगून गेलीस.फेरदेखील धरलास आमच्याबरोबर. हो की नाही ? ” सासूबाईंनी विचारलं .

” हो , हे मात्र खरं आई. इतकं प्रसन्न वाटलं त्या दिवशी!आणि मी ठरवून टाकलं की दरवर्षी वेळ काढून भजनाला उपस्थित रहायचंच!” सायली म्हणाली .

“हो ना ? तू रे शिरीष ,  सोवळं नाही,पण निदान आंघोळ करून आरती कर, म्हटलं की हेच- भाव महत्त्वाचा . अरे, त्या निमित्ताने शरीराबरोबर मनाचीही शुद्धी होते. आंघोळ करून मनही प्रसन्न होतं आणि मग आरतीच काय कुठलंही काम करायला फ्रेश वाटतं . एरवी मित्रांची पार्टी असली की जागताच ना तुम्ही. मग गोंधळ घालायचा का विचारलं की ‘आई , भाव महत्त्वाचा, देवी म्हणते का गोंधळ घाला’ म्हणून उडवून लावलं मला . अरे देव-देवी काहीच म्हणत नाहीत , हे सगळं आपल्या आनंदासाठी , आरोग्यासाठी आहे . एखादेवेळी नाही जमलं तर काहीच हरकत नाही. पण कालानुरूप बदल करून का होईना, प्रथा जपा रे . हे बघ. नेहमीच मागची पिढी जेवढं करते तेवढं पुढची पिढी करतच नाही . मी देखील माझ्या सासूबाई करत होत्या, तेवढं नाही करू शकले आणि सायली, तू पण नाही माझ्याएवढं करणार हे मलाही मान्य आहे . तरीही सारासार विचार करून जे जे शक्य आहे ते ते करायला काय हरकत?  भाव महत्त्वाचा पण कृती नसेल तर तो भाव निष्फळ होईल ना ? मी खूप बलवान आहे किंवा हुशार आहे हे सांगून होत नाही, त्यालाही काहीतरी कृतीची जोड द्यावीच लागते .

हे सणवार मनाला वेसण घालायला शिकवतात .मनाचे डाएट म्हणा ना. ते किती प्रमाणात करायचं, ते ज्याचं त्याने ठरवावं. पण करावं, असं मला वाटतं. असं म्हणजे असंच ह्या आपल्या कोषातून बाहेर पडून इतर गोष्टीतला आनंद दाखवतं. आपण आपली पाळंमुळं विसरून इतरांचं अनुकरण करतोय आणि ते आपल्या लक्षात येत नाहीये. भोंडला खेळायला आपल्याकडे वेळ नसतो. पण दांडिया खेळायला मात्र अगदी आवरून , मेकप करून आपण जातो . दांडिया खेळू नये, असं नाही. पण आपलीही संस्कृती, परंपरा आपणच जपल्या, त्यासाठी खास वेळ काढला तर काय हरकत ? आणि अर्थातच ते करण्यासाठी भाव आणि कृती दोघांची सांगड घालणं महत्त्वाचं. तरच पुढची पिढीही ह्या परंपरा पुढे नेईल. तुम्ही जाणते आहात , काय खरं खोटं किंवा योग्य अयोग्य तुम्हाला चांगलंच कळतं ना. मग श्रद्धा , अंधश्रद्धा हेही तुम्हाला कळेलच की. जे चुकीचं वाटेल ते नका करू ,सारखं भाव महत्त्वाचा म्हणत विशेषतः धार्मिक कर्तव्यांपासून पळू नका . बाकी तुमची मर्जी.उद्या असेन मी, नसेन मी…” गुडघ्यावर हात टेकत सासूबाई आत गेल्या .

शिरीष आणि सायली स्तब्ध झाले होते . असे  शिरीष सायली प्रत्येक घरात आहेत . पटत असलं तरी त्यांचा इगो आणि peer pressure आड येतं .

असो , माझा संस्कृती रक्षणाचा भाव तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून मी त्याला लेखन कृतीची जोड दिली , एवढंच !

लेखिका : डॉ. शिल्पा जोशी क्षीरसागर

प्रस्तुती : सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शास्त्रीय जागर… – लेखिका :डॉ. शिल्पा जोशी क्षीरसागर ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

शास्त्रीय जागर… – लेखिका :डॉ. शिल्पा जोशी क्षीरसागर ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी

“काय कटकट आहे!” म्हणत, पाय आपटत श्रुतिका आरतीला आली. तिच्या चेहेऱ्यावरचा त्रासिक भाव आईने टिपला होता. आरती झाल्यावर प्रसादासाठी पुढे आलेल्या हातावर चापट देत आई म्हणाली, “आता कशाला प्रसादाला पहिला नंबर? यायचं नव्हतं ना आरतीला?”

अर्धवट कळत्या , १३ वर्षे वयाच्या श्रुतिकाला हे पूजा, आरती, नवरात्र सगळं बोरिंग वाटत होतं. आज आईने तिला समजवायचं ठरवलं. “काय गं, तुला माहीत आहे का, नवरात्र का करतात?” आईने विचारलं. तशी ती रागाने म्हणाली, “त्यात काय, काहीतरी ऑर्थोडॉक्स रूढी. कुठे देवी पाहिली कोणी? पण म्हणे ९ देवींची पूजा असते. मम्मा , तू काहीही म्हण, मला पटत नाही हे.” “अगं, पण तुला कोणी सांगितलं की देवींची पूजा करण्यासाठीच नवरात्र आहे, असं. त्याला शास्त्रीय आणि वैचारिक दोन्ही आधार आहेत.ऑर्थोडॉक्स आहे की नाही, तूच ठरव,” आई म्हणाली. “हँ, त्यात काय शास्त्रीय? ” श्रुतिका.

“बाळा, नवरात्र हे बी- बियाणांच testing kit आहे. पूर्वी आतासारखी खूप बियाणं किंवा खतं नव्हती. मग सगळ्या प्रकारची धान्यं थोडी थोडी टाकून त्याचं एकप्रकारे टेस्टिंग केलं जातं नवरात्रात की ह्यांच्यापासून पीक कसं येईल? ” “हो का? Interesting आहे. पण मग आताच का?” श्रुतिकाला प्रश्न पडला, म्हणून आईला बरं वाटलं. “बरोबर विचारलंस.अगं, या दरम्यान रब्बी पिकांचा हंगाम सुरू होतो, आणि ती पिकं पाण्यावर वाढतात ना मग हा trial pack बरं का!” आईने उत्तर दिलं.

“wow, मम्मा, भारीच की, आणि लोकांनी ते मनापासून करावं म्हणून देवाचं नाव, हो ना?” श्रुतिका एकदम excite झाली होती. ” पण मग आई ते, तू जोगवा मागायला का पाठवते? मला नाही आवडत. खूप embrassing वाटतं” श्रुतिकाने आईला मनातलं सांगितलं. “हे बघ बाळा, मी म्हटलं ना, वैचारिक पण पार्श्वभूमी आहे. जोगवा मागणे म्हणजे काय?तर आपला वृथा अभिमान बाजूला ठेवून शरण जाणे. पूर्वी लोक ह्या मागितलेल्या जोगव्यावर पोट भरायचे. तुमच्या भाषेत इगो बाजूला ठेवून गरीब लोकांची दुःखं समजून घ्यायची. आता तुम्ही जाताच ना ते चॅरिटी का काय साठी पैसे मागायला? मग देवाच्या नावाने मागितलं तर छिद्र पडतं का अंगाला?”

“Right मम्मा, तो ‘फुलोरा’ का? त्यातली पापडी खूप आवडते मला.” श्रुतिकाचं डोकं आता शंकांनी भरलं होतं. आई हसून म्हणाली, ” किती चौकशा त्या! अगं , मी म्हटलं ना, रब्बी पिकाचा हंगाम सुरू होतो, मग दिवसभर शेतात राबायचं तर घरी काहीतरी कोरडा खाऊ असावा, मुलंही खातात. ते तुम्ही इव्हनिंग स्नॅक म्हणतात ना, तेच! आणि हो तेच त्याकाळचे chatting चे साधन होते फुलोरा लाटायला एकत्र आलेल्या बायकांना! Live whatsapp!”

 “आई, कसले हुशार होते गं  आपले पूर्वज! मग आता सांग, कुमारिकेची पूजा कशाला? आता मला का नाही बोलवत आणि, लहान मुलींनाच का?”

“वेडाबाई, प्रत्येक स्त्री मध्ये प्रचंड शक्ती आहे. ही देवीची रूपं त्याचीच जाणीव करून देतात, ती लहानपणीच करून दिली तर त्यांना गम्मत पण वाटते आणि आपण काही तरी भारी करू शकतो हे त्यांच्या मनावर ठसतं. पूर्वी, लवकर लग्न व्हायची, पाळी यायच्या आधीच, त्यामुळे कुमारिका ह्या छोट्याच असायच्या एवढंच! ते काय तुम्ही म्हणता ना toddler, teenager वगैरे-त्यांचं मोटिवेशन गं.” -आई.

“आयला, सॉरी, म्हणजे कमाल ग आई. प्रत्येक दिवसाला आणि सणाला काहीतरी आधार आहे. आता लास्ट , ते धान का धाण म्हणजे तो तुरा लावून का जायचं सीमोल्लंघनाला?” श्रुतिकाची प्रश्नावली संपणार म्हणून आईने हुश्श केलं. “मी म्हटलं ना, टेस्टिंग किटमधलं कुणाचं बियाणं चांगलं आहे, हे त्या दिवशी कळतं. मग, तुमची काय ती पायलट स्टडी गं!” श्रुतिकाच्या डोळ्यातली चमक आईला बरंच काही सांगत होती.

“आणि आई , मला माहीत आहे, दसरा म्हणजे, आपल्यातल्या रावणाला किंवा दुर्गुणांना, रामाने म्हणजे सद्गुणांनी जिंकायचं आणि ते हृदयापासून करायचं म्हणून हृदयाच्या आकाराची आपट्याची पानं प्रतीक म्हणून लुटायची, बरोब्बर ना?”

“म्हणूनच तुला सांगते, भारतीय संस्कृती, right choice है बेबी.”- आई.

आज आईने सुप्त कल्पकता वापरून तिच्यातल्या सरस्वती आणि श्रुतिकामधल्या दुर्गाचा नवरात्रानिमित्त  शास्त्रीय जागर केला होता.

लेखिका : डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर

प्रस्तुती : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares