मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ फ्यूज उडालेले बल्ब… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

फ्यूज उडालेले बल्ब... 💡 – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

फ्यूज उडालेले सगळे बल्ब एकसारखेच असतात !!

एक वरिष्ठ अधिकारी सेवानिवृत्त झाल्यावर महाला सारखे सरकारी घर सोडून एका हाउसिंग सोसायटीत, त्यांच्या स्वत:च्या फ्लॅट मध्ये राहायला गेले.

ते सेवा निवृत्त असले तरी, स्वतःला एक मोठा अधिकारी समजत असतं आणि कधीही कोणाशी जास्त बोलत नसतं.

ते दररोज संध्याकाळी सोसायटीच्या पार्क मध्ये फिरत असतानासुद्धा, दुसऱ्यांची उपेक्षा करत आणि तिरस्कृत नजरेने पाहात असत.

एके दिवशी त्यांच्या शेजारी बसलेल्या एका ज्येष्ठ गृहस्थाने त्यांच्याशी संभाषण सुरू केले आणि हळूहळू या गप्पा-गोष्टी पुढेही चालू राहिल्या. आता ते दोघे रोज संध्याकाळी भेटत आणि खूप गप्पा मारत.

प्रत्येक वेळी त्यांचे बोलणे बहुत करून एकतर्फी असे, कारण ते निवृत्त होऊन आलेले अधिकारी एक सारखे फक्त स्वतःबद्दलच बोलत असत.

ते कधीही बोलायला लागले की म्हणायचे, “सेवा निवृत्त व्हायच्या आधी मी इतक्या पदावर कार्यरत होतो, की तुमच्यापैकी कोणीही त्या पदाची कल्पनासुद्धा करू शकणार नाही, केवळ नाइलाज आहे म्हणून मी येथे आलो आहे. ” आणि ते गृहस्थ अशाच अनेक गप्पा करत असत आणि ते दुसरे वयस्कर गृहस्थ शांतपणे त्यांचे सगळे बोलणे ऐकून घेत असत.

बरेच दिवसांनंतर एके दिवशी त्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याने इतर ज्येष्ठ नागरिकांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता दाखविली, तेव्हा मग त्या गृहस्थाने इतर प्रत्येक व्यक्तीची माहिती देण्यास सुरुवात केली.

ते म्हणाले,“सेवा निवृत्त झाल्यावर, आपण सगळे फ्यूज वुडलेल्या बल्बसारखे असतो. याने काही फरक पडत नाही की त्या बल्बची वॉट क्षमता किती होती, फ्यूज व्हायच्या आधी त्याने किती प्रकाश अथवा उजेड दिला. “

पुढे ते म्हणाले……

” मागील 5 वर्षांपासून मी ह्या सोसायटीत रहात आहे, परंतु आजपर्यंत कोणालाही हे सांगितले नाही की मी दोन वेळा सांसद म्हणून राहिलो होतो.

.. तुमच्या उजवीकडे वर्माजी आहेत, जे भारतीय रेल्वेत महाप्रबन्धक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत….. तिकडे सिंग साहेब आहेत, जे सेनेत मेजर जनरल होते.

.. तिकडे बाकावर पांढऱ्या शुभ्र पोशाखात बसलेले ते गृहस्थ मेहराजी आहेत, जे इस्रो (ISRO) च्या प्रमुख पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.

 — – आजपर्यंत त्यांनी ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही, मलासुद्धा, पण मला माहीत आहे.

सगळे फ्यूज उडालेले बल्ब आता एक समानच आहेत – त्यांची वॉट क्षमता काहीही असो – 0, 10, 40, 60, 100 वॉट – आता त्याने काहीही फरक पडत नाही.

.. आणि यामुळे सुद्धा काही फरक पडत नाही की फ्यूज उडायच्या आधी तो कोणत्या प्रकारचा बल्ब होता – एलईडी, सीएफएल, हॅलोजन, फ्लोरोसेंट, किंवा सजावटीचा.

.. आणि माझ्या मित्रा, हीच गोष्ट तुलासुद्धा लागू होते. ज्या दिवशी तुला ही गोष्ट समजेल, त्यादिवशी तुला या सोसायटीतसुद्धा शांती आणि समाधान लाभेल… उगवता सूर्य आणि मावळता सूर्य दोन्ही अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसतात. परंतु, खरे पाहता उगवत्या सूर्याला जास्त महत्त्व दिले जाते. इतके की त्याची पूजा सुद्धा केली जाते. पण मावळत्या सूर्याला तितके जास्त महत्त्व दिले जात नाही.

….. ही गोष्ट जितक्या लवकर समजेल तितके चांगले आहे. “

आपलं वर्तमान पद, नाव आणि रुबाब हे स्थायी नसतात.

या गोष्टींबद्दल जास्त जिव्हाळा व आसक्ती ठेवली असता, आपले जीवन अधिकच गुंतागुंतीचे होते कारण एके दिवशी आपण ह्या सर्व गोष्टींना मुकणार असतो.

लक्षात ठेवा की जेव्हा खेळ संपतो, तेव्हा राजा आणि प्यादे एकाच डब्यात बंदिस्त होतात.

आपल्या जवळ जे काही आहे त्याचा आनंद घ्या आणि भविष्यात उत्तम जीवन जगा. हवा तर समाज कार्यास वेळ द्या !

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मला जरा आराम हवा आहे…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “मला जरा आराम हवा आहे” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

“आई मला जरा आराम हवा आहे.. “

शाळेत जाणारी मुलगी अभ्यास, शाळा, क्लास करून थकून आईला म्हणाली.

“अगं चांगला अभ्यास कर, नंतर आरामच करायचा आहे.. “

मुलगी उठली, अभ्यासाला लागली आणि आराम करायचा राहून गेला.

“आई थोडा वेळ दे आरामाला, ऑफिस च्या कामातून थकून गेलीये मी पार.. “

अगं लग्न करून सेटल हो एकदाची, मग आरामच करायचा आहे..

मुलगी लग्नासाठी तयार झाली आणि आराम करायचा राहून गेला.

“अहो इतकी काय घाई आहे, एखादा वर्ष थांबू ना जरा.. “

“अगं मुलं होऊन गेली वेळेवर की टेन्शन नाही, नंतर आरामच करायचा आहे… “

मुलगी आई बनली आणि आराम करायचा राहून गेला..

“अगं तुलाच जागरण करावं लागेल, मला ऑफिस आहे उद्या.. थोडे दिवस फक्त, मुलं मोठी झाली की आरामच करायचा आहे.. “

ती बाळासाठी रात्रभर जागी राहिली आणि आराम करायचा राहून गेला.

“अहो मुलं आता शाळेत जायला लागली, जरा निवांत बसू द्या की मला.. “

“मुलांकडे नीट लक्ष दे, त्यांचा अभ्यास घे, नंतर आरामच करायचा आहे… “

ती मुलांचा प्रोजेक्ट करायला बसली आणि आराम करायचा राहून गेला..

“आता मुलं स्वतःच्या पायावर उभी राहिली, आता जरा निवांत झाले मी.. “

“आता यांच्या लग्नाचं पाहावं लागेल, ती एक जबाबदारी पार पाडली की मग आरामच करायचा आहे.. “

तिने कंबर कसून सगळा कार्यक्रम आटोपला आणि आराम करायचा राहून गेला..

“मुलं संसाराला लागली, आता मी आराम करणार.. “

“अगं आपली सुधा गर्भार आहे, माहेरी बाळंतपण करायचंय ना तिचं.. “

मुलीचं बाळंतपण आवरलं आणि आराम करायचा राहून गेला..

“चला, ही पण जबाबदारी पार पडली, आता आराम. “

“सासूबाई मला नोकरी परत जॉईन करायची आहे.. आरव ला सांभाळाल का?”

नातवाच्या मागे दमली आणि आराम करायचा राहून गेला..

“चला नातू मोठा झाला, आता सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या.. आता मी आराम करणार.. “

“अगं ऐकलं का, गुडघे दुखताय माझे, उठवलं जात नाही.. Bp वाढलाय वाटतं, डायबिटीस पण आहे.. डॉकटर ने वेळेवर पथ्यपाणी करायला सांगितलंय बरं का.. “

नवऱ्याची सेवा करायला उरलं सुरलं आयुष्य गेलं.. आणि आराम करायचा राहूनच गेला..

एक दिवशी देवच आला खाली, आराम करायचाय ना तुला? तिने हात जोडले आणि देव घेऊन गेला.. अखेर तिला आराम मिळाला, अगदी दिर्घकाळाचा.. !!!

सर्व स्त्रियांना समर्पित
👌💐 👍💐👌

लेखक  : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आयुष्याचं ‘व्यवस्थापन’… – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

 

📚 वाचतांना वेचलेले 📚

☆ आयुष्याचं ‘व्यवस्थापन’ – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

कुठे व्यक्त व्हायचं आणि कधी समजून घ्यायचं

हे कळलं तर, आयुष्य ‘भावगीत’ आहे.

*

किती ताणायचं आणि कधी नमतं घ्यायचं

हे उमजलं तर आयुष्य ‘निसर्ग’ आहे.

*

किती आठवायचं आणि काय विसरायचं,

हे जाणलं तर आयुष्य ‘इंद्रधनूष्य’ आहे.

*

किती रुसायचं आणि केव्हा हसायचं…

हे ओळखलं तर आयुष्य ‘तारांगण’ आहे.

*

कसं सतर्क रहायचं आणि कुठे समर्पित व्हायचं,

हे जाणवलं तर आयुष्य ‘नंदनवन’ आहे.

*

कुठे? कधी? किती? काय? केव्हा? कसं?

याचा समतोल साधता आला तर, आयुष्य खूप सुंदर आहे.

*

त्रास असतानाही प्रामाणिक राहणं, संपत्ती असूनही साधं राहणं,

अधिकार असूनही नम्र राहणं, राग असूनही शांत राहणं,

– – – यालाच आयुष्याचं ‘व्यवस्थापन’ म्हणतात.

 

कवी : अज्ञात 

संग्रहिका : सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ब्रेडची टोपली… – लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? वाचताना वेचलेले ?

☆ ब्रेडची टोपली… – लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी 

काल दुपारी मी परत तिच्या घराबाहेर ब्रेडच्या टोपल्या बघितल्या. शेजारी पाटी लिहिली होती, “ज्यांना खरोखर जरूर आहे, त्यांनीच फक्त हवे तेवढे ब्रेडचे लोफ घ्यावेत. आज मी एवढेच देऊ शकते. संपले असतील तर दार वाजवून अजून आहेत का विचारू नये. ”

दोन मोठ्या टोपल्यात साधारण २५-३० ब्रेडचे लोफ होते. मी गेले कित्येक महिने चालायला जाताना त्या ब्रेडच्या टोपल्या बघत होते. मला हे नक्की काय चाललंय हे जाणून घेण्याची फार इच्छा होती, म्हणून मी तिचं दार वाजवलं. बराच वेळ कुणी दार उघडलं नाही. मी परत जायला निघाले.. तेवढ्यात त्या घराच्या खिडकीतून आवाज आला, “काय हवंय?”

मी म्हणाले, “या ब्रेडबद्दल कुतूहल होतं. बाकी काही नाही. मला ब्रेडची जरूर नाही. ”

तिनं दार उघडलं. साधारण पन्नाशीतली एक बाई नर्सच्या पोशाखात दारात दिसली. “तू पत्रकार आहेस का? कुठल्या वर्तमानपत्रासाठी लिहिणार असशील, तर मला बोलायचं नाही. ”

“नाही नाही.. मी पत्रकार नाही. मी नेहमी चालायला येते या रस्त्यावर. ही ब्रेडची टोपली तुम्ही ठेवता? कुणासाठी? मी काही मदत करू शकते का?” मी म्हणाले.

ती म्हणाली, ”मी जवळच्या हॅास्पिटलमधे नर्स म्हणून काम करते. काही वर्षांपूर्वी एक पेशंट ॲडमिट झाला. तो लहान असताना त्याच्या घरची अत्यंत गरीबी होती. वडील पाव, बिस्कीटं तयार करणारे बेकर होते. त्यामुळे तो पण ब्रेड, पेस्ट्री उत्तम बनवत असे. वडील गेल्यावर, १५-१६ वर्षांचा असल्यापासून तो एका टोपलीत ब्रेड भरून गावात हिंडून विकत असे. त्यातून बरा पैसा मिळू लागल्यावर पै पै जमवून त्याने स्वत:ची बेकरी सुरू केली. हळूहळू सर्वांनाच या बेकरीचे पदार्थ खूप आवडू लागले. त्याच्या हातात चार पैसे आले. खाण्याची मारामार संपली. घरही घेतलं. गाड्या घेतल्या.

या गावानं आपल्याला खूप काही दिलं, या भावनेनं त्यानं गरजूंसाठी ताजे ब्रेडचे लोफ दर रविवारी दोन तीन टोपल्या भरून घराबाहेर ठेवायला सुरूवात केली. तासाभरात ते लोफ गरजू लोकांनी नेलेले असत. काही लोक टोपलीत चार पैसे टाकत, एखादी थॅंक्यू नोट टाकत, तर कधी बाहेर ब्रेडला जेवढे पैसे पडतात तेवढे टाकत. एकदा कुणीतरी एक चांदीची बांगडी सुध्दा टाकली होती.

त्याचा संसार सुखाने चालला होता. मुलंबाळं चांगली निघाली. या टोपलीतील ब्रेड नेणाऱ्यांच्या दुव्यांमुळे आपलं दारिद्र्य संपलं, भरभराट झाली असं त्याला वाटायचं. काही संकटं आली, पण ती दूर झाली. वयाच्या ७६ वर्षी तो अल्पशा आजाराने गेला. त्याची बायको पण वर्षात गेली. त्याने ICU मधे असताना मला विचारले, ”मी तुझ्या नावाने काही पैसे ठेवत आहे. दर आठवड्याला गरजू लोकांसाठी तू ब्रेडची टोपली ठेवशील का? मला एके काळी ब्रेडचा एक तुकडा मिळायची मारामार होती. ते इतरांच्या नशिबी येऊ नये, म्हणून मी हे आयुष्यभर करत आलो आहे. माझी मुलं म्हणतात की याची जरूर नाही. म्हणून तुला विचारत आहे.. मुलांना समजत नाही की देणाऱ्याला देव कधी काही कमी पडू देत नाही. ”

मी ‘हो’ म्हणाले. कुठेही त्याच्या नावाचा उल्लेख नसावा आणि वर्तमानपत्रात बातमी, फोटो काही नसावेत, एवढीच त्याची अट होती. त्यानं दिलेले पैसे वापरून मी दर रविवारी दाराबाहेर ब्रेड ठेवू लागले. गेल्या वर्षी त्यानं दिलेले पैसे संपले. मी माझ्या पैशांनी कधी पाच, दहा, पंधरा ब्रेड ठेवू लागले. लोकं ब्रेड घेतात व जमेल ते आणि भरपूर प्रेम या टोपलीत टाकतात. मलाही हे लोकांचं प्रेम आवडू लागलं. मागच्या वर्षीच्या वादळात जेव्हा माझ्या घरावर मोठं झाडं पडलं, तेव्हा पाच पन्नास लोक आले व त्यांनी सर्व सफाई करून माझं घर पूर्ववत करून दिलं. माझ्या अडचणी पण कमी होत गेल्या. कारण देणाऱ्याला देव कधी काही कमी पडू देत नाही. ”

मला खूप कौतुक वाटलं. ती म्हणाली, “त्यानं ही प्रथा सुरू केली आहे ती आपण चालू ठेवू. मला काही देऊ नको, पण तुझ्या घराबाहेर एक ब्रेडची बास्केट ठेव, म्हणजे त्याच्या आत्म्याला शांती लाभेल आणि तुला जेव्हा एखादा असा माणूस भेटेल, जो न चुकता ही प्रथा चालवेल, फक्त त्यालाच ही गोष्ट करायला सांग. कुणाला सांगायचे हे तुझं तुला कळेल, जसं मला तुझ्याशी बोलताना कळलं. ”

मी काही ब्रेडचे लोफ विकत घेतले व माझ्या घराबाहेर एका बास्केटमधे ठेवले. केवळ देणाऱ्याला देव कधी काही कमी पडू देत नाही म्हणून नाही.. पण त्या निनावी व्यक्तीने मरणानंतरही कुणाला ब्रेडचा एक तुकडा मिळण्याची भ्रांत पडू नये ही इच्छा व्यक्त केली म्हणून!

पैशाचा प्रश्नच नाही. कारण..

…देणाऱ्याला देव कधी काही कमी पडू देत नाही.

लेखिका : सुश्री ज्योती रानडे

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी.

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ““फक्त तुम्ही स्वतः व्यवस्थित रहा – –…” – लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “फक्त तुम्ही स्वतः व्यवस्थित रहा – –…” – लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

तुम्ही एकही झाड लावू नका,

ती आपोआप उगवतात,

तुम्ही फक्त – ती तोडू नका…

 

तुम्ही कुठलीही नदी स्वच्छ करू नका,

ती प्रवाही आहे,

स्वतः स्वच्छच असते,

तुम्ही फक्त – तिच्यात घाण टाकू नका…

 

तुम्ही शांतता प्रस्थापित करण्याच्या नादी लागू नका, सर्वत्र शांतताच आहे,

तुम्ही फक्त – द्वेष पसरवू नका…

 

तुम्ही प्राणी वाचवण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही,

ती क्षमता निर्सगात आहे,

फक्त – त्यांना मारू नका,

जंगले जाळू नका…

 

तुम्ही माणसं काहीही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू नका,

सर्व व्यवस्थितच आहे,

फक्त तुम्ही – स्वतःच व्यवस्थित राहा…

— — निसर्ग…

  ☆

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सिंहस्थ… कवी : कुसुमाग्रज ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ सिंहस्थ… कवी : कुसुमाग्रज ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले  

(कुंभ) 

व्यर्थ गेला तुका, व्यर्थ ज्ञानेश्वर

संतांचे पुकार, वांझ झाले

*

रस्तोरस्ती साठे, बैराग्यांचा ढीग

दंभ शिगोशीग, तुडुंबला

*

बँड वाजविती, सैंयामिया धून

गजांचे आसन, महंता‌सी

*

आले खड्ग हाती, नाचती गोसावी

वाट या पुसावी, अध्यात्माची?

*

कोणी एक उभा, एका पायावरी

कोणास पथारी, कंटकांची

*

असे जपीतपी, प्रेक्षकांची आस

रुपयांची रास, पडे पुढे

*

जटा कौपिनांची, क्रीडा साहे जळ

त्यात हो तुंबळ, भाविकांची

*

क्रमांकात होता, गफलत काही

जुंपते लढाई, गोसव्यांची

*

साधू नाहतात, साधू जेवतात

साधू विष्ठतात, रस्त्यावरी

*

येथे येती ट्रक, तूप साखरेचे

टँकर दुधाचे, रिक्त तेथे

*

यांच्या लंगोटीला, झालर मोत्याची

चिलीम सोन्याची, त्याच्यापाशी

*

येथे शंभराला, लाभतो प्रवेश

तेथे लक्षाधीश, फक्त जातो

*

अशी झाली सारी, कौतुकाची मात

गांजाची आयात, टनावारी

*

तुज म्हणे ऐसे, मायेचे माइंद

त्यापाशी गोविंद, नाही नाही.

कवी : कुसुमाग्रज

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आत्मविश्वास… एक बहुमूल्य संपत्ती…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “आत्मविश्वास… एक बहुमूल्य संपत्ती” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

हा असं वागला, तो तसं वागला, कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. तदुसऱ्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरूवात करा.

या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख, अडचणी, नाहीत. ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही हे सर्व भोगावं लागलंय. आपण तर साधारण मनुष्य आहोत. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरतो. कोणाच्या वाईट वागण्याने आपलं काहीही वाईट होत नसतं. मिळतं तेच जे आपण पेरलेलं असतं. आपल्याशी कोण कसही वागेना आपण सगळ्यांशी चांगलंच वागायचं. इतकं चांगलं की विश्वासघात करणारा ही पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे.

आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःच्या जीवनात संघर्ष करण्याची वेळ येते. आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी घाबरून जाऊ नका. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा आपण जिवंत आहोत म्हणजे खूप काही शिल्लक आहे. जी माणसं स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतात ती माणसं आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत.

जगणं कोणाचंही सोपं नसतं. आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्याला वाटत असतं. सर्वात सुखी माणूस तोच आहे जो आपली किंमत स्वतः ठरवतो आणि सर्वात दुःखी माणूस तोच आहे जो आपली तुलना इतरांशी करतो.

 

आपल्या किंमतीचा आणि हिंमतीचा अंदाज कधीच कुणाला सापडू देऊ नका. कारण समोरचा नेहमी आपल्या या दोनच गोष्टी शोधत असतो.

 

ज्या पात्रतेने तुम्हाला नोकरी दिली, तीच पात्रता एखाद्या व्यक्तीकडे आहे त्याला अजूनही नोकरी नाही.

ज्या प्रार्थनेचे उत्तर देवाने तुमच्यासाठी दिले, तीच प्रार्थना इतर लोक करत आहेत पण यश मिळाले नाही.

 

तुम्ही रोज सुरक्षितपणे जो रस्ता वापरता, तोच रस्ता आहे जिथे अनेकांनी आपले मौल्यवान जीव गमावले.

ज्या मंदिरामध्ये देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला, त्याच मंदिरामध्ये इतर लोकही पूजा करतात, तरीही त्यांचे जीवन विसंवादात आहे.

तुम्ही हॉस्पिटलमध्‍ये वापरलेला बेड, तुम्‍ही बरे झालात आणि डिस्चार्ज मिळाला, त्याच बेडवर इतर अनेकांनी अखेरचा श्वास घेतला.

ज्या पावसाने तुमच्या शेतात चांगले पीक आले, त्याच पावसाने दुसऱ्याचे शेत उध्वस्त केले.

याचा विचार करा, कारण तुमच्याकडे जे काही आहे ती फक्त “ईश्वरी कृपा” आहे. तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टींचा तो दाता आहे. म्हणुनच तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ रहा.

 

 पश्चात्ताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाही. म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे. दुसऱ्यांबद्दल वाईट बोलुन त्यांचे दुर्गुण सांगून, आपला चांगुलपणा आणि कर्तृत्व कधीच सिद्ध होत नसते.

वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नये. कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात, त्या नक्कीच संपतात. कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते, ज्याच नाव आहे, “आत्मविश्वास”

जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं आणि जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी. समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले आहात म्हणून… !!!

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ …आणि आनंदाने जगा… – लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ …आणि आनंदाने जगा… – लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

अमेरिकेत घरी स्वयंपाक करणे बंद झाल्यावर काय झाले…?

1980 च्या दशकातील प्रख्यात अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांनी अमेरिकन लोकांना चेतावणी दिली.

स्वयंपाकघर खाजगी कंपन्यांच्या ताब्यात देण्यात आले असून, सरकारनेही वृद्ध आणि लहान मुलांची काळजी घेतल्यास कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि त्याची प्रासंगिकता नष्ट होईल… पण तो सल्ला फार कमी लोकांनी ऐकला.

घरी स्वयंपाक करणे बंद झाले आणि बाहेर ऑर्डर करण्याच्या सवयीने बरीचशी अमेरिकन कुटुंबव्यवस्था नष्ट झाली… !

घरात स्वयंपाक करणे म्हणजे कुटुंबाला एकत्र ठेवणे, आपुलकीने जोडणे. पाककृती ही केवळ कला नाही… ! तर ते एक कौटुंबिक संस्कृती आणि समाधानाचे केंद्र आहे…!

घरात जर स्वयंपाकघर नसेल आणि फक्त बेडरूम असेल तर ते कुटुंब नाही त्याला वसतिगृह किंवा हॉटेलच म्हणावे लागेल !

स्वयंपाकघर बंद करून एकच बेडरूम पुरेशी आहे असे वाटणाऱ्या अमेरिकन कुटुंबांचे काय झाले… ?

1971 मध्ये, 71 टक्के यूएस कुटुंबांमध्ये मुलांसह जोडीदार होते, परंतु आज, पन्नास वर्षांनंतर, ही संख्या 20 टक्क्यांपर्यंत घसरली आहे, कुटुंबे आता नर्सिंग होममध्ये राहतात.

अमेरिकेत 15% स्त्रीया एकट्या राहतात.

12% पुरुष कुटुंबात एकटेच राहतात.

19% घरांची मालकी फक्त वडिलांची किंवा आईची आहे.

केवळ 6% कुटुंबात पुरुष आणि महिला एकत्र आहेत.

अलिकडच्या काळात जन्माला आलेल्या बाळांपैकी 41% शिशु अविवाहित स्त्रियांपासून जन्माला आली आहेत त्यापैकी निम्म्या अपरिपक्व मुली शाळेत जाणाऱ्या आहेत, ही अतिशय गंभीर वस्तुस्थिती आहे…

41% ही खूप मोठी आकडेवारी आहे. म्हणजेच अमेरिकेत कौमार्य असे काही उरले नाही…

परिणामी, अमेरिकेत सुमारे 50 टक्के पहिले विवाह घटस्फोटात,

 67 टक्के द्वितीय विवाह आणि 

74 टक्के तृतीय विवाह समस्याग्रस्त आहेत.

फक्त बेडरूम म्हणजे कुटुंब नाही.

 स्वयंपाकघर नसेल तर….

 युनायटेड स्टेट्स हे तुटलेल्या लग्नाचे उदाहरण आहे.

 आपल्या देशातील नागरिकांना कायमस्वरूपी खाद्यपदार्थ दुकानातून विकत घेण्याची सवय लागली तर इथली कुटुंबव्यवस्था देखील अमेरिकेप्रमाणे नष्ट होईल कुटुंबे उद्ध्वस्त झाली की मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडते.

बाहेरील अन्नपदार्थ खाल्ल्याने शरीर लठ्ठ आणि बेढब बनते मग लहान-मोठे आजार, इन्फेक्शन आदी समस्या उद्भवतात व खर्च देखील वाढतो…

घरात स्वयंपाक करणे आणि घरातील सदस्यांसोबत बसून खाणे हे कुटुंब व्यवस्थेसाठी हिताचे आहे!

अर्थव्यवस्थेसाठी शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य देखील आवश्यक आहे.

म्हणूनच पुर्वजांनी आम्हाला बाहेरचे न खाण्याचा सल्ला दिला पण……………

आज आपण आपल्या कुटुंबासोबत रेस्टॉरंटमध्ये जेवतो… स्विगी, झोमॅटो, उबेर यांसारख्या फूड सर्व्हिस कंपन्यांकडून दिवसा किंवा रात्री कोणत्याही वेळी शरीराला लहान-मोठे आजार होऊ देणारे अन्न खाण्यासाठी ऑनलाइन ऑर्डर करतो…

अगदी उच्चशिक्षित, मध्यमवर्गीय लोकांमध्येही आता ही फॅशन झाली आहे.

भविष्यात ही सवय समाजासाठी मोठी आपत्ती ठरणार आहे…

आपण काय खावे हे ऑनलाइन कंपन्या ठरवतात… जेणेकरून डॉक्टर आणि औषध कंपन्यांची कमाई वाढेल…

 आपले पूर्वज प्रवासात अथवा तीर्थयात्रेला जाण्यापूर्वी घरात बनवलेले अन्नपदार्थ सोबत घेऊन जात असत.

 म्हणूनच घरी स्वयंपाक करा,

 आणि…

 आनंदाने जगा…!

(सोशल मिडीयाचा वापर लोकांना प्रभावित करण्यासाठी नाही तर लोकांच्या आचरणात आणि विचारात परिवर्तन करण्यासाठी करा.)

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “तुम्ही मुंबईतल्या खानावळीत कधी जेवला आहात काय?” – लेखक : प्रबोधनकार ठाकरे ☆ माहिती संकलन व प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “तुम्ही मुंबईतल्या खानावळीत कधी जेवला आहात काय? – लेखक : प्रबोधनकार ठाकरे ☆ माहिती संकलन व प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

जातिभेदाला पहिली थप्पड… (जुन्या आठवणी)

जुन्या मुंबईत चहाचे हॉटेल आणि पाव-बिस्कुटाची बेकरी हे दोन धंदे प्रामुख्याने भंडारी लोकांच्या हातांत होते. सबंध मुंबईला ब्रेड, पाव, लिमजी बिस्किटे या भंडारी बेकऱ्याच पुरवीत असत आणि गोऱ्या लोकांच्या खाणवळीतही त्या ब्रेड पावांची लज्जत वाखाणली जात असे. काही भंडारी हॉटेलात चहाशिवाय मांसाहाराची फार चोखट सोय असे आणि अशी तीन-चार जुन्यांतली जुनी भंडारी हॉटेले कोटांत नि गिरगांवात अजून चालू आहेत. भंडारी हॉटेलातच चहा मिळत असल्यामुळे, बामणांची पंचाईत व्हायची. गिरगांवात एक-दोन बामणांची छुपी हॉटेले गल्लीकुच्चीत असायची. तेथे गुपचूप जाऊन कित्येक बामण चहाची तलफ चोरून भागवीत असत. कारण, त्याकाळी हॉटेलात उघडपणे चहा पिणे अथवा काही खाणे प्रशस्त मानले जात नसे. चार-पाच मंडळींनी कुडाच्या पडद्याआड गुपचुप बसून खावे प्यावे नि पसार व्हावे. दारूच्या गुत्त्यांत शिरणारांकडे लोक जितक्या कुत्सित काण्या नजरेने पाहत नि धिक्कार दर्शवीत, त्याच नजरेने लोक हॉटेलगामी प्राण्यांकडे पाहत असत. मात्र या बामणी छुप्या हॉटेलात बामणांचाच प्रवेश व्हायचा. इतरांना तेथे मज्जाव असायचा.

पहिल्यापासूनच मुंबई शहर म्हणजे नोकरमान्यांचे माहेरघर. बाहेरगांवाहून नोकऱ्यांनिमित्त तरुणांच्या टोळ्याच्या टोळ्या नित्य येथे यायच्या. बिन-हाडाची (म्हणजे चंबूगबाळे ठेवण्याची सोय एखाद्या ओळखीच्या किंवा नातेवाईकाच्या ओसरीवर झाली, तरी मम्मंची ब्याद तो किती दिवस भागवणार? अर्थात, सार्वजनिक खाणावळीची आवश्यकता पुढे आली. या दिशेने पहिला धाडसी यत्न भटवाडीतल्या सखूबाईने केला. विधवा बाईने असा एखादा स्वतंत्र धंदा अगर व्यवसाय करणे, ही कल्पनाच त्या काळी मोठी बंडखोर. शहाण्यासुरत्यांच्या भावना एकदम जखमी व्हायच्या! पण सखुबाईने सर्व सामाजिक विकल्पांना झुगारून खाणावळीचा धंदा सुरू केला. मुंबईच्या हिंदू खाणावळीच्या इतिहासात या सखूबाईचे नाव अग्रगण्य आहे. सखूबाईने खाणावळ उघडताच, पहिला मोठा पेचप्रसंगाचा प्रश्न आला, तो म्हणजे आमच्या नाठाळ जातीभेदाचा. खाणावळीत बामण येणार तसे इतर अठरापगड बामणेतरसुद्धा येणार. या सगळ्यांच्या निरनिराळ्या जातवार पंगती मांडायच्या तर मलबार हिलचे अंगणसुद्धा पुरायचे नाही. आणि बामणेतरांच्या पंगतीला बामणे जीव गेला तरी बसायची नाहीत. या पेचावर सखुबाईने दणदणीत तोड काढली. तिने प्रत्येक अन्नार्थी बुभुक्षिताला स्पष्ट बजावले- “माझी खाणावळ अन्नार्थ्यांसाठी आहे. मी बामण ओळखीत नाही नि जातपात मानीत नाही. प्रत्येक हिंदूला मी एका पंगतीला सारखे वाढणार… अगदी पाटाला पाट नि ताटाला ताट भिडवून वाढणार. जरूर असेल तर त्यांनी यावे, नसेल त्याने खुशाल भुके मरावे. मला त्याची पर्वा नाही. कोणी कुरबुर दुरदुर करील, त्याला भरल्या ताटावरून ओढून उठवून हाकलून देईन. “

झाले. कर्दनकाळ सखूबाईचा हा दण्डक जाहीर होताच, यच्चावत बामणे नि बामणेतर खाणावळीत पाटाला पाट भिडवून गुण्यागोविंदाने जेऊ लागले. सकाळ संध्याकाळ हजार-पाचशे पाने उठू लागली. हाताच्या बोटांवर मोजण्याइतके काही कर्मठ ब्राम्हण, सखुबाईच्या खास मेहरबानीने मुकटे नेसून एका लहानशा अंधाऱ्या खोलीत सोवळ्याने जेवत असत. त्या खोलीला सखूबाई ‘विटाळशीची खोली’ असे म्हणत. मोठ्या पंगतीत वाढणी चालत असली म्हणजे साहजिकच या सोवळ्या बामणांकडे वाढप्यांचे दुर्लक्ष व्हायचे. “अहो, आमटी आणा, चपाती आणा, हे आणा, ते आणा. ” असा ते ओरडा करायचे. बराच ओरडा झाला की सखूबाई गरजायची, “अरे बंड्या, त्या विटाळशा बाया काय बोंबलताहेत तिकडे पहा. ” त्या सोवळ्या जेवणारांनी तक्रार केली, तर बाई स्पष्ट सांगायची, “हे पहा, मोठ्या पंगतीचे काम टाकून तुमच्याकडे ‘पेशल’ पाहणार कोण? तुम्हाला सगळे ‘पेशल’ पाहिजे तर ते मला जमणार नाही. वाढप्याच्या सोयीसोयीनेच घेतले पाहिजे तुम्हाला. चांगले मोठ्या जमातीत बसून गुण्यागोविंदाने खावे, गप्पागोष्टी सांगाव्या, ते बसता कशाला त्या अंधाऱ्या खोलकटांत सुतक्यासारखे ?” 

सखूबाईचे उदाहरण पाहून मागाहून गिरगांवात आणखी तीन-चार ब्राह्मण विधवांनी खाणावळीचा उपक्रम केला आणि तो अगदी सखूबाईच्या शिस्तीने चालवला. झावबाच्या वाडीतली भीमाबाई आणि मुगभाटातली चंद्रभागाबाई यांच्या खाणावळी सारख्या जोरात चालत असत. दरमहा रुपये सात आणि साडेसात, असे दोनच भाव असत. सातवाल्यांना ताक आणि साडेसातवाल्याना दूध-दही एवढाच फरक. बाकी सगळी व्यवस्था सारखी. त्यात प्रपंच नाही. रविवारी काहीतरी “पेशल’ बेत असायचा आणि तो मंडळीना विचारून ठरायचा. सणावारी मिष्टान्न भोजनाच्यावेळी कोणी कमी जेवले तर बाई उस्तळायची, “कायरे, आधी कुठे हाटेलात शेण खाऊन आला होतास वाटतं?” असा भरमंडळीत टोमणा द्यायची. प्रत्येक आसामीला दरमहा चार पाहुण फुकट. मग ते ‘पेशल’ बेताला अथवा सणावारी आणले तरी तक्रार नाही. एखादा इसम दोन-तीन वेळा आला नाही, तर सखूबाई लगेच त्याच्या बिऱ्हाडी आपला माणूस पाठवून चौकशी करायची आणि आजारी असला तर तो बरा होऊन जेवायला परत येईपर्यंत दोन्ही वेळेला साबुदाण्याची पेज बिनचूक घरपोच पाठवावयाची. हा प्रघात बाकीच्या सर्व खानावळीतही पाळत असत.

सखूबाईच्या तोंडाला फारसे कोणी तोंड देत नसत. देईल त्याचे असे काही वाभाडे काढायची ती, का सगळ्या पंगतीची भरमसाट करमणूक! तिचा तोंडपट्टा चालला असता मध्येच कोणी काही बोलला तर एक पेटंट वाक्य असायचे, “चूप, मध्येच मला ‘ॲटरप्रॅट’ करू नकोस. अरे, एवढा मोठा तो जस्टिस रानडा नि तो चंद्रावर्खर ! माझ्या खाणावळीत जेवले म्हणून हायकोडताचे जड्ज झाले, समजलास. ” एखादाचे दोन महिन्यांचे बिल थकले आणि तो लाजेकाजेसाठी खाणावळीत येण्याचे टाळू लागला, तर बाई त्याला मुद्दाम बोलावून आणायची आणि हात धरून जेवायला घालायची. मग सगळ्या पंगतीत त्याची कानउघाडणी करायची, “अरे मुंबईची नोकरी म्हणजे अळवावरचं पाणी. आज गेली तर उद्या मिळेल दुसरी. पण मेल्या, उपाशी राहून तू काय करणार? उपाशी पोटाने नोकऱ्या मिळत नाहीत. तुझा हात चालेल तेव्हा दे पैसे. पण जेवायला टाळाटाळ करशील तर ओतीन भाताचे आधाण तुझ्या बोडक्यावर. ” पंगती चालल्या असताना, कमरेवर हात देऊन बाई पंगतीतून शतपावल्या घालायची. प्रत्येकावर काही ना काही टीका, टिप्पणी, टिंगल सारखी चालायची. सणावारी तर पोटभर जेवण्यावर तिचा फार मोठा कटाक्ष. मधून मधून एका रांगेने चार-पाच बामणे सारखे बसलेले पाहिले का मग सोवळ्यावर सखूबाईंचे टिंगलपुराण असे काही बेफाम चालायचे का पुढच्या खेपेला ते सारे बामण पंगत मोडून सरमिसळ बसायचे.

तात्पर्य, सहभोजनाने जातीभेदाचे बंध तुटले नाहीत तरी किंचित ढिले पाडण्याची कामगिरी आजकालच्या समाज-सुधारकांच्या कल्पनेत फुरफुरण्यापूर्वीच सखूबाईने हा धाडसी प्रयोग केलेला आहे आणि त्याचे महत्त्व हिंदूंच्या सामाजिक सुधारणेच्या इतिहासात डावलता येणार नाही.

लेखक : प्रबोधनकार ठाकरे

माहिती संकलन आणि प्रस्तुती : मोहन निमोणकर 

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “पु. ल. – दि ग्रेट…” – संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “पु. ल. – दि ग्रेट” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

मराठीत “लागण्याची” गंमत बघा:

बाजूच्या गावात एक चित्रपट *लागला* होता.

तो बघून परत येतांना वाटेत मित्राचा बंगला “लागला”.

त्याचा मुलगा माझ्या ऑफीस मध्ये नुकताच “लागला” होता.

बंगल्यात शिरतांना कमी उंचीमुळे दरवाजा डोक्याला “लागला”.

घरचे जेवायचा आग्रह करू “लागले”. मला जेवणात गोड “लागतं” हे माहिती असल्याने गोड केलं होतं.

भात थोडा “लागला” होता पण जेवण छान होतं. जेवणानंतर मला सुपारी दिली ती नेमकी मला “लागली”. पाहुण्यांना आपल्यामुळे त्रास झाला ही गोष्ट घरच्यांना फार “लागली”.

निघताना बस फलाटाला “लागली”*च होती, ती *”लागली”च पकडली.

पण भरल्या पोटी आडवळणांनी ती मला बस “लागली”. मग काय…

घरी पोहोचेपर्यंत माझ्या पोटाची मला भलतीच काळजी “लागली” कारण आल्या आल्या घाईची “लागली”.

थोडक्यात माझी अगदी वाट “लागली”..

घरची मंडळी हसायला “लागली”.

The only & only Great पु ल!!

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares