मराठी साहित्य – विविधा ☆ वयाने तरुण व विचारांनी म्हातारा भारत… ☆ श्री हेमंत तांबे ☆

श्री हेमंत तांबे 

🔅 विविधा 🔅

☆ वयाने तरुण व विचारांनी म्हातारा भारत… ☆ श्री हेमंत तांबे 

🌹 *वयानं तरुण व विचारांनी म्हातारा भारत हे चित्र आपण बदलू शकतो 🌹

🌷 गोष्ट अशी आहे, चीनमध्ये एक कृतिशील विचारवंत लाओत्से ऐंशी वर्षांचा म्हाताराच जन्माला आला. डोक्याचे केस चक्क पिकलेले आणि चेहऱ्यावर सुरकुत्या ! हा लाओत्से म्हणजे आपल्या कडील बुध्द म्हणू शकता ! पण लाओत्सेचे विचार आजही मार्गदर्शक आहेत !! तरूण आहेत !!! त्याच्या जन्माची गोष्ट अविश्वसनीय आहे, कोणीही विश्वास ठेवणार नाही, माझाही नाही……. पण आपण प्रतिकात्मक रित्या असा विचार करू शकतो……… कारण भारतीयांची मानसिकता तपासली तर या चीनी गोष्टीवर विश्वास ठेवावा लागतो.

🌷 बहुतांश भारतीय म्हातारेच जन्माला येतात, मी वयानं म्हणत नाही, तर दृष्टीनं विचारानं आचारानं ! माणसाचं शरीर जवान मर्द असू शकतं, पण मन भूतकाळात रमुन म्हातारं झालेलं असू शकतं !

🌷 आपल्याला सर्वत्र तरुण दृष्टिस पडतील, पण तरुणाईसाठी मुलभूत गोष्टींची वानवा तुम्हाला दिसेल. मी युवक त्यालाच म्हणेन ज्याची ओढ भविष्याकडे असेल. Young is that one, who is future oriented and old is that one who is past orinted ! कोणत्याही वयस्कर व्यक्तीला भेटा, तो भूतकाळातील आठवणीत रमलेला दिसेल. तो पुढे म्हणजे भविष्यात पाहणार नाही, कारण त्याला मृत्यू दिसत असतो. जवान मात्र भविष्यात पाहील, कारण त्याला मृत्युची भिती नसते, काही अदम्य करण्याची इच्छा असते ! आपण रशिया, अमेरिका किंवा इतर प्रगत राष्ट्रांतील युवक पाहा. ते अंतरिक्षात यात्रा करण्याची इच्छा ठेवतात. आकाशाला गवसणी घालण्याची इच्छा बाळगून आहेत आणि भारतीय तरुण पहा भविष्याची कोणती कल्पना, योजना, Utopia नाही….. गेल्या दहा वर्षात चित्र बदलू लागलंय मात्र तरुणांची संख्या आणि त्यांची भविष्या बाबत वास्तव स्वप्नं यांचं प्रमाण अत्यंत व्यस्त आहे ! आपण भविष्यासाठी जगतो, भविष्यासाठी स्वप्नं रंगवतो….. पण जर भविष्यासाठी स्वप्न नसेल तर भविष्य अंधकारमय आहे, निश्चित समजा !

🌷 आपण भुतकाळात फार रमतो, भुतकाळ संपन्न होता हे सांगणारी पुस्तकं वाचतो, भुतकाळातील हिरो आपले आदर्श असतात. थोडक्यात आपला इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहावा इतका सुंदर होता, या आठवणीतच रममाण आपण असतो. आणि यात अयोग्य काहीच नाही……… पण त्यातील समृद्ध वारशाची चर्चाच करायची, की तो अंगिकारून पुढं जायचं ? यावर आपण गप्प असतो !

🌷 लक्षात घ्या. आपण कार चालवत आहात, कारला तीन आरसे पाठी दिसायला असतात. आता जर कार पुढं न्यायची असेल, तर तुम्ही पूर्णवेळ आरशात पाहू शकत नाही, त्यानं अपघात होईल ! भुतकाळात झालेल्या चुका पाहायच्या व त्या पुन्हा होऊ नये म्हणून बोध घेऊन पुढंच जायचं, त्या चुकांचा कोळसा उगाळत बसलात तर हात काळे होतील !….. भारताचा दोन हजार वर्षांचा इतिहास असा पाठी पाहून पुढं चालण्याचा आहे, म्हणून अपघात जास्त झाले. गेल्या दोन हजार वर्षांत आपण अनेक खड्ड्यात पडलो. यशाची उत्तुंग शिखरं आपण पादाक्रांत केली नाहीत ! गुलामी, गरिबी, हीनता, कुरुपता, दिनता, अस्वस्थता पाहिली आहे !….. आजही आपल्यातील अत्यल्प तरुण भविष्यातील उत्तुंग शिखरं चढण्याची आकांक्षा बाळगतात….. मी भुतकाळ व भविष्या बद्दल फार लिहित नाही, पण एक धारणा आपण मनाशी पक्की केली आहे……… सत्ययुग होऊन गेलंय आता कलियुग आहे, कोणतीही चांगली गोष्ट घडू शकणार नाही !…. *ही महामुर्खांची मानसिकता आहे !!*

🌷 राम, कृष्ण, नानक, महावीर, बुध्द, कबिर, छ शिवाजी, म राणा जे चांगले होते ते होऊन गेले, आता होणार नाहीत. पण लक्षात ठेवा, जोपर्यंत आपण भविष्यात चांगले महानुभाव तयार करत नाही, तोपर्यंत भुतकाळात असे महानुभाव होऊन गेले हे पटवून देणं कठीण जाईल. जोपर्यंत आपण भविष्यात नवनवीन श्रेष्ठता निर्माण करू शकत नाही, तोपर्यंत भुतकाळातील श्रेष्ठता काल्पनिकच वाटणार कारण, आपली चांगल्याच्या निर्मितीची परंपरा आपण खंडित केली !

🌷 जोपर्यंत आपण भविष्यातील कृष्ण राम तयार करत नाही, तोपर्यंत राम कृष्ण हे काल्पनिकच वाटणार….. कारण चांगला मुलगाच साक्ष देऊ शकतो, की माझा बाप चांगला होता ! जर आपण भविष्यात लाचार, दरिद्री, कंगाल, भिक्षांदेही असू तर कोणीही मान्य करणार नाही, भारतात सोन्याचा धूर निघत होता !………… आपण फक्त गुंड, बदमाश, चोर, लुटारू निर्माण केले तर छ शिवाजी, छ संभाजी, महाराणा प्रताप वगैरे विभुती इथं निर्माण झाल्या यावर कोण विश्वास ठेवील ? सद्यस्थितीतील तरुणाईनं दररोज नवनवीन प्रगतीची शिखरं काबिज केली नाहीत, तर आपण या महान विभुतींचे वारसदार आहोत, यावर कोण विश्वास ठेवील ?……. आपल्यातूनच जर बाबा आमटे, प्रकाश आमटे, विकास आमटे, अभय बंग, आंबेडकर, फुले, शाहू, धोंडो कर्वे, आगरकर, कर्मयोगी पाटील, विनोबा, स्वातंत्र्यवीर, विठ्ठल रामजी शिंदे, स्वामीनाथन, विलासराव साळुंखे वगैरे वगैरे कर्मयोगी तयार झाले, हे कशाच्या आधारावर आपण म्हणू शकतो ?

🌷 आज परिस्थिती बदलतेय, ध्येय धोरणं inclusive केली जात आहेत. विश्वगुरूची स्वप्नं आपल्याला दाखवली जाताहेत. प्रगतीचे मार्ग निष्कंटक केले जात आहेत, अशावेळी दूरदृष्टीनं भविष्याचा वेध घेऊन तरुणाईनं श्रेष्ठ ध्येयाप्रत पोचण्यासाठी सर्वस्व डावावर लावणं आवश्यक आहे ! टाचणी ते विमान निर्मितीसाठी आपण दुसऱ्यावर अवलंबून होतो….. आज परिस्थिती आमुलाग्र बदलली आहे, या बदललेल्या ecosystem चा फायदा जर तरुणांनी घेतला नाही, तर या तरुणांच्या ह्रासाला तरुणच जबाबदार आहेत, दुसरं कोणी नव्हे !

🌷 आज नाही तर उद्या संपूर्ण जग आपली खिल्ली उडवणार आहे, या जगद्गुरु विषयावरून….. जेव्हा कोणी म्हणेल मी श्रीमंत होतो, तेव्हा समजून जा तो गरीब आहे, जेव्हा कोणी म्हणेल मी ज्ञानी होतो, तेव्हा समजून जा, तो अज्ञानाच्या खाईत लोटला गेला आहे, जेव्हा कोणी म्हणेल आमची शान होती, तेव्हा समजून जायचं, ती शान आता मातीमोल झाली आहे !

🌷 भुतकाळात डोकावून पाहणं योग्य असलं, तरी भुतकाळ डोक्यात साठवणं धोकादायक आहे. कारण जगणं वर्तमानात असतं !

🌷 एका गोष्टीत आपण most productive आहोत आणि ती गोष्ट म्हणजे reproduction ! आपली लोकसंख्या आपण अमर्याद वाढवली. अमेरिकेला फक्त ४०० वर्षांचा इतिहास आहे आणि भारताला किमान १२–१५ हजार वर्षांचा इतिहास आहे. मग अमेरिका एवढी समृद्ध कशी झाली ? दुनियेतील अनेक देशांमध्ये भिकारी आहेत, पण एक पूर्ण देश भिकारी म्हणून १९७२ साली जगापुढे उभा कसा राहिला ?

🌷 मी युवा त्याला म्हणतो, जो भविष्याकडे उन्मुक्त आहे आणि वयस्कर म्हातारा म्हणजे ज्याला भुतकाळाप्रती प्रेम आहे, याला वयाचं बंधन नाही. आपण एक हजार वर्षे गुलाम होतो आणि केव्हाही परत गुलाम होऊ शकतो. म्हातारा मृत्यूला घाबरतो, तर जवान मृत्युला अंगावर घेतो. म्हातारा म्हणतो जे होतं ते माझ्या भाग्यात आहे, युवा किंवा जवान म्हणेल मी माझ्या मनगटाच्या जोरावर भाग्य लिहिन. म्हातारा म्हणतो जे होतंय ते देव करतोय, जवान म्हणेल मी जे करीन त्याला ईश्वरीय आशीर्वाद असेल. जवान संघर्ष तर म्हातारा अल्पसंतुष्ट……. ही अल्पसंतुष्टता आपण घालवली नाही, तर दुष्काळ, बेरोजगारी, महामारी, परावलंबित्व यांचीच पूजा आपण करत असतो ! यालाच म्हातारपण म्हणतात !!…… भविष्यासाठी योजना बनवा, अल्पसंतुष्टता सोडून द्या, एक निर्माणाची असंतोषकारी अभिप्सा आवश्यक आहे, एक सृजनाची आस पाहिजे…. *जेव्हा आपण दुःख, अज्ञान, रोगराई, दिनता, दरिद्रता, दास्यता संपवण्याची शपथ घेतो, तेव्हा भविष्य निर्मितीला सुरूवात होते !*
एक छोटीशी गोष्ट सांगून हे प्रबोधन थांबवतो.

🌷 एकदा जपान मध्ये एका छोट्या राज्यावर एका मोठ्या शत्रूनं आक्रमण केलं. ते सैन्य हद्दीवर येऊन उभं राहिलं… या छोट्या राजाचा सेनापती तरूण, साहसी, लढवय्या होता. तो जाऊन शत्रू सैन्य पाहून आला आणि राजाला म्हणाला महाराज, आपण या शत्रूशी लढून जिंकू शकत नाही, त्यांची खूप मोठी फौज आहे, आपले शिपाई कापले जातील व परत हरणं नशिबात येईल !… राजा सेनापतीला म्हणाला, तु तर जवान आहेस आणि असा म्हाताऱ्या सारखा वागतोस ?… आणि राजा नगरातील एका साधूकडे गेला आणि सर्व परिस्थिती सांगितली. अनेक वेळा राजा त्या साधूचा सल्ला घेत असे……. साधूनं राजाला सल्ला दिला, ताबडतोब त्या सेनापतीला तुरुंगात टाक. त्याची चुक झाल्येय. सेनापती मनानं हरलाय, त्यानं हार मानली आहे. आणि ज्यानं मनानं हार मानली, त्यानं प्रत्यक्षातील हार निश्चित केली !… मी युद्धासाठी निघत आहे!… राजानं सेनापतीला तुरुंगात टाकलं, पण विचार करत होता, या साधूला तर तलवार कशी धरायची हे सुध्दा माहीत नाही आणि हा युध्द कसं करणार ?

🌷 साधूनं तलवार घेतली व सर्व सैनिकांना आदेश देऊन युध्दावर निघाला. सैनिक साशंक होते. वाटेत एक देऊळ होतं. तिथं थांबून तो साधू सैनिकांना म्हणाला, मी देवाला विचारून येतो, युद्ध जिंकणार की नाही ?…. सैनिक म्हणतात, साधू महाराज, आपल्याला देवाची भाषा तर येत नाही….. साधू म्हणतो, मी हे नाणं देवाच्या पायावर ठेऊन वर उडवणार आहे. जर आपल्या राजाचा छाप वर आला, तर आपण युद्ध जिंकणार !…… आणि त्यानं तसं केलं. छाप वर आला…… साधूनं सांगितलं, आपण प्राणपणानं लढलो तर युद्ध जिंकणार आहोत, देवानं कौल दिला आहे !! आता आपण हरायचं असं ठरवलं तरी हरू शकत नाही, चला युद्ध सुरू करा, विजय आपलाच होणार आहे !!!

🌷 युध्द झालं. साधूची सेना प्राणपणानं लढली आणि जिंकली.

युध्दावरून परत येताना वाटेत ते देऊळ लागलं. साधू आपला नगराकडे निघालाय, सैनिक म्हणतात साधू महाराज, देवाचे आभार मानून पुढं जाऊया……..
साधू सांगतो, त्याची काहीच आवश्यकता नाही. नाण्याच्या दोन्ही बाजूला आपल्या राजाचाच शिक्का आहे !

🌷 ते सैनिक जिंकले होते, कारण विचार अंततः वस्तूत रुपांतरीत होतात. विचार घटना बनून जातात.

Sir Arthur Eddington – (Philosopher of science) says, “Things are thoughts and thoughts are things!

🌷 मी भारतीय मनाला युवा, तरूण, रसरशीत, उत्फुल्ल, कृतिशील पाहू इच्छितो. कारण आपण दोन हजार वर्षे म्हाताऱ्या सारखा विचार केला. हे भारतीय जनमानसातील म्हातारपण घालवलं पाहिजे ! विचार वय विसरायला लावतात, चांगला विचार करा, आचार सुधारेल, काम तयार आहे, आपल्या काम करणाऱ्या हातांची आवश्यकता आहे !

 🙏🌹शुभेच्छा ! 🌹🙏

© श्री हेमंत तांबे

पाटगाव. 

मो – 9403461688

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महाराष्ट्रातील संत स्त्रिया – भाग – ६ – संत बहिणाबाई…☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ महाराष्ट्रातील संत स्त्रिया – भाग – ६ – संत बहिणाबाई… ☆ सौ शालिनी जोशी

संत बहिणाबाईंचा जन्म वेरूळ जवळील देवगाव येथे. आई-वडील, जानकी व आवजी कुलकर्णी यांनी वयाच्या केवळ पाचव्या वर्षी पाठक आडनावाच्या एका तीस वर्षाच्या बिजवराशी बहिणाबाईंचा विवाह करून दिला. पण मुलीच्या लग्नासाठी काढलेले कर्ज आई-वडिलांना फेडणे शक्य झाले नाही. म्हणून जावयासह सारे कुटुंब घर सोडून प्रवासाला बाहेर पडले. पंढरपूर, शिंगणापूर करत कोल्हापूरला आले. एका ब्राह्मणांने त्यांना आश्रय दिला. बहिणाबाईंचे वय केवळ आठ वर्षाचे होते. पण त्यांना ईश्वराची अनावर ओढ होती. येथे जयरामस्वामी वडगावकरांची कीर्तने त्यांनी ऐकली. त्यातील तुकारामांच्या अभंगांनी त्या भारावल्या. सतत मुखात अभंग आणि तुकारामांचे ध्यान. ‘पती हाच परमेश्वर’ मानण्याचा तो काळ होता. बहिणाबाईच्या कर्मठ पतीला ते मानवले नाही. हात, पाय बांधून गोठ्यात टाकण्यापर्यंतच्या छळाला सामोरे जावे लागले. पण संसाराकडे तटस्थ भावनेने बघण्याचे सूत्र त्यांनी अवलंबले. करावं वाटतं ते करता येत नव्हतं. जे करावे लागत होतं ते आवडत नव्हतं. अशा कोंडीत त्या सापडल्या. तरीही प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड त्यांनी घातली. परमार्थाचा आनंद घेतला.

स्त्रियेचे शरीर पराधीन देह l न चाले उपाय विरक्तीचा l

शरीराचे भोग वाटतात वैरी l माझी कोण करी चिंता आता ll

अशी व्यथा त्या अभंगातून व्यक्त करतात.

बहिणाबाईंची निष्ठा पाहुनी संत तुकारामानी त्याना स्वप्नात दृष्टांत दिला. त्यावेळी त्या अठरा वर्षांच्या होत्या. त्यांचे जीवन बदलून गेले. ‘प्रपंच परमार्थ चालवि समान l तिनेच गगन झेलियेले l’ असे आपले जीवन त्यांनी आपण अभंगातून उलगडले. हळूहळू बहिणाबाईंचा लौकिक पसरू लागला. लोक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले. पण एका ब्राह्मण स्त्रीने शूद्र जातीच्या तुकारामाचे शिष्य व्हावे ही गोष्ट सनातन्यांना पटणारी नव्हती. नवराही संतापला. पण बहिणाबाई तुकारामांच्या अधिकार संपन्न शिष्या झाल्या. ‘मत्स जसा जळावाचूनि चडफडी lतैसी आवडली तुकोबाची l’अशा प्रकारची तगमग त्यांची तुकोबांविषयी असे. ‘स्वप्नामाजी कृपा केली पूर्ण’ अशी बहिणाबाईंची साक्ष आहे.

ब्रह्मज्ञांनी, भक्तीभाव व वैराग्याने त्या युक्त होत्या. नवऱ्याच्या संतापाला त्यांनी प्रतिक्रिया दिली.

‘भ्रताराची सेवा तोचि आता देव l भ्रतार स्वयमेव परब्रह्म ll

भ्रतार तो रवि मी प्रभा तयाची l वियोग त्याची केवी घडे ll

भ्रतारदर्शनाविण जाय दिस l तरी तेची राशी पातकांच्या ll

पुढे हळूहळू पतीचा स्वभाव बदलला.

काही दिवस त्या देहूला राहिल्या होत्या. तुकारामांची त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. तेथे असताना त्यांना दोन मुले झाली एक मुलगा व एक मुलगी. स्वतः ब्राह्मण असूनही ब्राह्मण कोण या विषयावर त्यांनी आपले सडेतोड विचार तत्कालीन सनातनी ब्राह्मणांना सांगितले. ‘ब्रह्म जाणणारा तो ब्राह्मण’ असे ठामपणे सांगितले. त्यांनी साधारण ७३२ अभंग लिहिले.

वारकरी संप्रदायाच्या इमारत उभारणीतील संतांच्या कार्याचे रूपकात्मक वर्णन करून संतांची माहिती लोकांवर बिंबवली. ती प्रसिद्ध रचना,

संत कृपा झाली इमारत फळा आली l

ज्ञानदेवे रचीला पाया उभारिले देवालया l

नामा तयाचा किंकर तेणे विस्तारले आवार l

जनी जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत l

तुका झालासे कळस भजन करा सावकाश l

बहिणी फडकती ध्वजा तेणे रूप केले ओजा l

त्यांचे अभंग अलंकारिक, रसपूर्ण, शांतरसाचे अधिक्य असलेले असे आहेत.

असे सांगतात की त्यांना आपल्या पूर्वीच्या १२ जन्मांचे स्मरण होते. चालू जन्म हा तेरावा होता. हे जन्म मरण्यापूर्वी त्यांनी अभंगातून आपल्या मुलाला सांगितले. ‘घट फुटल्यावरी l नभ नभाचे अंतरी l’ हा शेवटचा अभंग सांगितल्यावर त्या समाधीस्थ झाल्या. (१७००साली) शिरूर येथे त्यांचे समाधी आहे.

अशा या बहिणाबाई स्त्रियांना सुधारण्याचा मार्ग दाखवणाऱ्या क्रांतीज्योत !

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्त्री लेखन स्वातंत्र्य ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? विविधा ?

☆ स्त्री लेखन स्वातंत्र्य ☆ सौ राधिका भांडारकर

स्त्रियांना लेखन स्वातंत्र्य आहे का?

ती बोल्ड लिहू शकते का?

ती मनात येणाऱ्या सर्वच भावना सहजपणे लिहू शकते का?

या सर्व प्रश्नांना माझे एकच उत्तर आहे “हो”

“का नाही?”

पण ती लिहीत नाही हे सत्य आहे. चौकटी, मर्यादा, समाजाचे दडपण कोणत्याही प्रकारे तिच्या लेखनासाठी बंधनकारक आहेत असे मला वाटतच नाही.

स्त्रियांचे लेखन संकुचित असायला कारण स्त्री स्वतःच आहे. कारण बऱ्याच वेळा ती स्वतःच उंबरठे ओलांडायला, चौकटी मोडायला, व्यक्त व्हायला,

स्वतःच्या जीवनावर मोकळेपणाने भाष्य करायला तयारच नसते. परिणामी संसार, मुलंबाळं, कौटुंबिक नाती, सासु सुना, नातवंड, नवरा, जावई, सासरे, माहेर, अंगण याच्या पलीकडे स्त्री लेखन वाचायला मिळतच नाही. तिचं लेखन तिच्यापुरतं, तिच्या विश्वापुरतच मर्यादित असलेलं अनुभवायला येतं. फारफार तर नोकरी करणारी एखादी स्त्री लेखिका असेल तर थोडा वेगळा विषय ती हाताळताना जाणवतं परंतु तो विषय हाताळतानाही तिची मुळातली संसारिक सूत्रं वेगळी झालेली जाणवत नाहीत.

तिने लिहिलेल्या कथा, कादंबऱ्या, कविता, ललित यातही चौकटीतलंच स्त्री जीवनाचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. काही प्रमाणात विनोदी लेखन करणाऱ्या स्त्रिया आहेत पण त्यातही वाढलेलं वजन, माझे डाएट, शेजारीण, नाचगाण्यासारखे छंद, फसलेली पाककला, अवास्तव खरेदी, दुकानातले सेल, नवऱ्याचं बिच्चारेपण, अचानक येणारे पाहुणे या घरगुती विषयांव्यतिरिक्त फारसं काही वाचायला मिळत नाही. अभिरुची संपन्न, समाजाभिमुख असे पुल, सुभाष भेंडे, द. मा. शंकर पाटील, चिं वि. जोशी, दिवाकर वगैरे पुरुष लेखकांसारखं विनोदी लेखन सामर्थ्य स्त्री लेखिकांमध्ये अभावानेच आढळते. साहित्य क्षेत्रात स्त्री लेखिका आणि पुरुष लेखक असे दोन वेगळे विभाग नकळतच होतात. त्याला एक प्रमुख कारण म्हणजे स्त्री आणि पुरुषांच्या वैचारिकतेतील भिन्नता, निरीक्षण शक्ती आणि अभ्यासही. एका ठराविक परिघातच जगत असताना तिचे जीवनातले अनुभवही मर्यादित, चौकटीतलेच असतात. त्या पलिकडच्या जीवनाचा ती विचारही करू शकत नाही. परिघापलीकडे खूप मोठे मानवी जीवन आहे आणि ते टिपण्याचा किंवा त्याही जीवन प्रवाहाचा दूरस्थपणे भाग होऊन निरीक्षणात्मक वैचारिकतेचा प्रभाव तिच्या लेखनावर पडलेला दिसत नाही. ही वास्तविकता असताना समाजाने तिच्या लेखनावर मर्यादा टाकल्या आहेत किंवा ती बोल्ड लिहूच शकत नाही या म्हणण्याला काहीच अर्थ नाही. ठीक आहे! एक स्त्री. . “स्त्री विषयकच” लिहिणार परंतु त्यातही बहुतांशी स्त्री लेखिकांचे विचार, अनुभव, निरीक्षण, कल्पनांची व्याप्ती तोकडीच वाटते. तोच तोच पणा जाणवतो. याचं समर्थन “ती बंधनात असते म्हणून. . ” हे होऊच शकत नाही. माझ्या मते स्त्री जेव्हा एखादी कथा, कादंबरी किंवा लेख लिहिते तेव्हा त्यातूनही ती स्वतःला पाहत असते. स्वतःच्या प्रतिमेला जपत असते. “एक स्त्री असूनही तिने असं का लिहिलं?” या समाजाच्या टिकेचं भय तिनेच तिच्यावर पांघरलेलं असतं. आपल्या लेखनातून आपल्यावर “संस्कृती, नीती मूल्याचे पतन झाले” असे ओरखडे ओढले जाऊ नयेत हा प्रचंड मानसिक अडथळा तिच्या मनात तिनेच निर्माण केलेला असतो म्हणून ती मुक्त होऊ शकत नाही आणि मुक्तपणे लिहू शकत नाही.

अर्थात असेही अनुभव स्त्री लेखिकांना आलेले आहेत. कविता महाजन, मेघना पेठे, गौरी देशपांडे यांनी स्त्रियांचेच प्रश्न अतिशय धैर्याने आणि मुक्तपणे हाताळलेत. काही ना त्यांचे लेखन फार आवडलं तर काहींनी नाके मुरडली मात्र वेगवेगळ्या अभिरुचीचे, जडणघडणीचे वाचक हे असणारच पण लेखकाने (स्त्री अथवा पुरुष कुणीही) समाजाचा आरसा बनून वास्तवतेचे दर्शन(सुंदर ते ओंगळ) मुक्तपणे घडवून देऊ नये असा अर्थ होऊ शकत नाही. सखाराम बाईंडर, पुरुष, गिधाडे, बॅरिस्टर या गाजलेल्या नाटकांसारखी, ज्वलंत तडफडणारे विषय असलेली निर्मिती एखादी स्त्री लेखिका करू शकेल का? वास्तविक या टोकाच्या बोल्ड लेखनातही स्त्रियांच्या समस्या आहेत पण त्या पुरुष मनाच्या दृष्टिकोनातून मांडलेल्या आहेत म्हणजेच इथे महत्त्वाचा भाग येतो तो दृष्टिकोनाचा. स्त्री लेखिका स्वतःचे दृष्टिकोन विस्तारित का करू शकत नाही? तसलीमा नसरीन, इस्मत चुगताई, मन्नु भंडारी, कमला दास अरुंधती रॉय सारख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच लेखिका. समाजाचा प्रचंड विरोध आणि मानहानीला सामोरे जाऊनही त्यांनी लिहिलं. ते चांगलं वाईट याची मीमांसा न करता मुक्तपणे त्यांनी लिहिलं आणि समाजाची एक बाजू उघडी करण्याचं धाडस दाखवलं यात गैर काय??

स्त्री लेखनात विषयाची व्यापकताही कमी दिसते. अश्लीलता टाळूनही शृंगारिक लेखन करता येतं. प्रेमकथा आणि प्रणय कथा यात फरक आहे पण भावनांचा अविष्कार उलगडणारं स्पष्ट लेखन स्त्री लेखिकांकडून होताना दिसत नाही हे सत्य आहे.

 “न राहवून त्याने तिचा पटकन् मुकाच घेतला” किंवा “तिच्या भरदार वक्षस्थळांवर त्याची नजर खिळून राहिली. ” अशा तर्‍हेची भाषा किंवा वाक्यरचना स्त्री लेखिका सहजपणे करू शकेल का? का करू नये? का हरकत असावी? शब्द खेचून धरावेत की मुक्तपणे त्यांची प्रासंगिक उधळण करावी हा चर्चेचा विषय आहे.

कवी कालीदासांच्या मेघदूतातलं यक्षाच्या प्रेयसीचं वर्णन जर सुंदरच वाटू शकतं तर एखाद्या स्त्रीलेखिकेने केलेलं, त्यातलं सौंदर्य जाणून केलेलं रसभरित वर्णन “बोल्ड” का ठरावं? तेव्हा सरळ, सात्विक, मसालेदार किंवा बोल्ड असं काही नसतंच. त्या प्रसंगाची तीच मागणी असते असा विचार का करू नये?

लेखक किंवा लेखिका जेव्हा काही लेखनकृती करते तेव्हा त्यात स्वत:ची गुंतवणूक आणि अलिप्तता दोन्हीची गरज असते. आपण निर्माण केलेल्या पात्रांशी बंध जुळणे आणि प्रत्यक्षात ती पात्रं अलिप्तपणे पाहणे या दोघांचा समतोल साधला गेला तरच उत्कृष्ट आणि मुक्त विचारांचे लेखन होऊ शकतं हे एक लेखनतत्व आहे. त्यात समाज, स्व प्रतिमा, बंधने, मर्यादा याचा प्रश्नच येत नाही. माझ्या मते लेखकाची जबाबदारी ही आहे की भोवतालच्या समाज जीवनाचा सखोल अभ्यास करून त्यावरचे वास्तविक दर्शन देणारे लेखन करतानाही समाजाला चांगला सकारात्मक संदेश देणं ही लेखकाची जबाबदारी आहे. स्त्री लेखकाची आणि पुरुष लेखकाची ही.

काळाबरोबर जीवन पद्धती बदलतात. संस्कृती, नीतीच्याही व्याख्या बदलतात आणि बदलत्या जीवनपद्धतीवर सहअनुभूतीने विचार करून लिहिण्याचे सामर्थ्य स्त्रीलेखिकेकडूनही नक्कीच अपेक्षित आहे. आणखी एक मुद्दाही मला महत्त्वाचा वाटतो “मी एक स्त्री लेखिका म्हणून जेव्हा विचार करते” तेव्हा मला एक जाणवतं की मी रत्नाकर मतकरीं सारखी सुसूत्र गूढकथा नाही लिहू शकत. किंवा आगाथा ख्रिस्ती सारख्या रहस्यकथा लिहितानाही मी कमी पडते. माझ्याच मनाला मी बजावते की हा माझा जॉनर नाही पण हे कितपत स्वीकारार्ह आहे? खरं म्हणजे याला एकच कारण गूढकथा, रहस्यकथा लिहिण्यासाठी लागणारी अफाट कल्पनाशक्ती याचा अभाव. बहुतेक स्त्री लेखिकांबाबत हेच घडत असावं. कल्पनाविश्व किंवा कल्पनाशक्तीचे अपुरेपण यामुळेही स्त्री लेखिका त्याच त्या लेखन वर्तुळात फिरत राहते म्हणून याही गुणांना जाणीवपूर्वक विकसित करण्याची स्त्री लेखिकांना फार गरज आहे असे म्हटले तर ते गैर ठरू नये. ”घरात असता तारे हसरे मी पाहू कशाला नभाकडे” असा वैचारिक कल नसावा. माथ्यावरच्या विशाल नभाकडे जाणीवपूर्वक पाहण्याची दृष्टी मिळवावी आणि मुक्त लेखन बिनधास्त करावे याच मताची मी आहे. मेलोड्रामा किंवा गिमीक्समध्ये अडकू नये. एखाद्या घटनेकडे ती जशी आहे तशी बघण्याची आणि शब्दातून व्यक्त करण्याची गरज ओळखावी. असे लेखन यापूर्वीही स्त्री लेखिकांकडून झालेले आहे. पद्मजा फाटकची हसरी किडनी सुनीता देशपांडे यांचं आहे मनोहर तरी माधवी देसाई यांचं नाच गं घुमा किंवा कांचन घाणेकर यांचे “नाथ हा माझा” स्नेहप्रभा प्रधान यांचं स्नेहांकिता अगदी लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्रे ही बोल्ड लेखन प्रकारातलीच नव्हे का? अगदी अलीकडेच मी मृदुला भाटकर यांचं “हे सांगायलाच हवं” हे आत्मवृत्त वाचलं. असं लिहायला स्वातंत्र्यापेक्षा धाडसाची गरज असते. म्हणजेच स्त्रिया बोल्ड लिहू शकत नाहीत या विचार प्रवाहाला का वाहू द्यायचे?

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ५३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ५३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- मी नाईराजानं ते पैशाचं एन्व्हलप खिशात ठेवलं. पूर्वीपेक्षाही त्या पैशांचं ओझं मला आता जास्त जाणवू लागलं. ते ओझं हलकं केल्याशिवाय मलाच चैन पडणार नव्हती. मी सर्वांचा निरोप घेतला. जाताना केशवरावांना म्हणालो,

“माझ्याबरोबर कोपऱ्यावरच्या रिक्षा स्टॉपपर्यंत चला ना प्लीज”. ते तयार झाले. मी मनाशी निश्चय पक्का केला. अगदी मनाच्या तळ्यातलं जे जे ते सगळं त्यांच्याशी बोलायचं असं ठरवूनच टाकलं. पण ते माझं बोलणंच नंतर पुढचं सगळं अतर्क्य घडायला निमित्त ठरणार होतं याची मला तेव्हा कल्पनाच नव्हती.)

केशवराव आणि मी घराबाहेर पडलो. चार पावलं चालून गेल्यावर वाटेतच एक सार्वजनिक बाग दिसली. मी घुटमळलो.

“काका, आपण इथं बागेत बसूया पाच मिनिटं? मला थोडं बोलायचंय. ” सगळा धीर एकवटून मी विचारलं. ते ‘बरं’ म्हणाले. आम्ही आत जाऊन बसलो. मला सुरुवात कशी करावी ते समजेचना.

“बोल. काय बोलणार आहेस.. ?”

‘तू लहान तोंडी मोठा घास घेऊ नकोस.. ‘ हे माझ्या मोठ्या बहिणीचे शब्द मला आठवले आणि आपलं कांही चुकत तर नाहीय ना असं वाटून माझं अवसानच गळून गेलं. मी मान खाली घातली. त्यांच्या नजरेला नजर मिळवण्याचं धाडस मला होईना.

“बोल ना अरे,.. तू गप्प कां? काय झालंय.. ?”

त्यांचे आपुलकीचे शब्द ऐकून मला थोडा धीर आला.

“घरी.. ताईपुढे.. हे सगळं बोलता आलं नसतं म्हणून तुम्हाला त्रास देतोय… ” मी कसंबसं बोलायला सुरूवात केली. आवाज भरून आला न् मी बोलायचं थांबलो. त्यांनी मला अलगद थोपटलं. त्या स्पर्शानेच माझे डोळे भरून आले. मी महत्प्रयासाने स्वतःला सावरलं.

“काका, थोडं स्पष्ट बोललो तर रागावणार नाही ना?”

“नाही रे बाबा,.. बोल तू. “

“काका, आमच्या ताईशी तुमचं लग्न झालं ती खूप नंतरची गोष्ट ना हो? त्याआधी ती आमचीच होती.. हो ना? आमच्या घरातली. आमच्याचसारखी. फक्त तिचं तुमच्याशी लग्न झालं म्हणून तिच्या सगळ्या सुखदुःखांवर फक्त तुमचाच अधिकार कसा?

त्यातला आमचा वाटा आम्हालाही द्या ना. तो तुम्ही दोघेही नाकारता कां आहात?.. ” माझा आवाज भरून आला. आवेग ओसरेनाच.

“अरे.. असं काय करतोयस वेड्यासारखं?” ते मला समजावू लागले.

“मग पुष्पाताई आणि काका दोघे इकडे आले, तेव्हा त्यांनी दिलेले पैसे घेतले कां नव्हते तुम्ही? ‘नको’ म्हणून नाकारलेत कां? आज माझी भाऊबीजही ताईने नाकारली. कां? मी फक्त वयानं लहान म्हणून कुणाला कांहीच विचारायचं नाही कां?… “

माझं बोलणं ऐकून ते मनातून थोडंसं हलले. निरूत्तर झाले. थोडावेळ शून्यांत पहात राहिले. आता स्पष्ट बोलायची हीच वेळ होती.

“काका, हे फक्त तुमच्यावर नाही, आपल्या सर्वांवर आलेलं संकट आहे हे लक्षात घ्या. तुम्ही एकटे नाही आहात. आपण आता मी सांगतो तशी कामं आपण वाटून घेऊया. नोकऱ्यांमधल्या दूरवरच्या पोस्टिंगमुळे मला न् दादाला इथे राहून ताईची काळजी घेता येत नाहीय याचं दोघांनाही वाईट वाटतंय. तेव्हा आईने ठरवलंय तसं ताई बरी होईपर्यंत आई इथे राहून सगळं घरकाम सांभाळू दे. तुम्ही आणि अजित-सुजित ताईच्या औषधांच्या वेळा, तिला हवं-नको सगळं बघताच आहात. अजितच्या काकूंची एरवीही सोबत असतेच शिवाय त्या

हॉस्पिटलायझेशन असते तेव्हा रात्रभर तिच्याजवळ थांबून तिला सांभाळतातही.. यातली कुठलीच जबाबदारी आम्हा भावंडांना मनात असूनही शेअर करता येत नाही. त्यामुळे आजपर्यंतचा आणि याच्या पुढचाही ताईच्या उपचारांचा सगळा खर्च आम्ही भावंडं एकत्रितपणे करणार आहोत. त्याला तुम्ही प्लीज नाही म्हणू नका.. “

मी बोलायचं थांबलो. माझ्या बोलण्यात नाकारण्यासारखं काही नव्हतंच. ऐकता ऐकता त्यांची नजर गढूळ झाली. नजरेतल्या ओलाव्याने त्यांचा आवाजही भिजून गेला.

“तुला माझ्या मनातलं, अगदी खरं सांगू कां?” ते म्हणाले, ” हे मी आत्तापर्यंत घरी कुणापाशीच बोलू शकलेलो नाहीये. कारण माझ्यासारखे घरातले आम्ही सगळेच तुझ्या ताईच्या विचारानेच अस्वस्थ आहोत. तुझ्या बोलण्यातली तळमळ मला समजतेय. तुम्हा सगळ्याच भावंडांच्या सदिच्छांचाच मला या अगतिकतेत खूप आधार वाटतोय. पण खरं सांगू? तुझी ताई आता थोड्याच दिवसांची सोबतीण आहे हे निदान मी तरी मनोमन स्वीकारलंय. पहिल्या दोन केमोजच्या रिअॅक्शन्स तिला खूप त्रासदायक ठरलेल्या आहेत. तिसरा डोस अजून साधारण महिन्यानंतर द्यायचाय. तो ती कसा सहन करेल याचंच मला दडपण वाटतंय. त्यानंतरच ऑपरेशनची गरज आहे कां नाही हे ठरेल. एखादा चमत्कार घडला तरच ऑपरेशन न करता ती बरी होईल हेच वास्तव आहे आणि मी ते स्वीकारलंय. म्हणूनच माझ्या मनातल्या या घालमेलीची तिला कल्पना येऊ न देता मी रोज हसतमुखाने तिला सामोरा जातोय. कसलेही अवास्तव हट्ट न करता अतिशय समाधानानं तिने मला आजवर साथ दिलेली आहे. मला तिचा उतराई व्हायचंय. म्हणूनच मी तिला समजावतो, धीर देतो, हेही दिवस जातील हा माझ्यापरीने तिला विश्वास देत रहातो. ‘तुला कांही हवंय कां?.. जे हवं असेल ते मोकळेपणाने सांग.. मी आणून देईन.. ‘ असं मी तिला नेहमी सांगत, विचारत रहातो. ती हसते. ‘काही नको.. मला सगळं मिळालंय’ म्हणते. खूप शांत आणि समजूतदार आहे ती. त्यामुळेच निदान बाकी कांही नाही तरी तिच्या औषधपाण्याचा खर्च माझ्या कष्टाच्या पैशातून झाल्याचं समाधान तरी मिळावं एवढीच माझी इच्छा आहे. माझी ही भावना तू समजून घे. माझ्या नुकत्याच झालेल्या रिटायरमेंट नंतर हे संकट आलंय. यामागे ईश्वरी नियोजन असेलच ना कांहीतरी? म्हणून तर नेमक्या गरजेच्या वेळी माझ्या फंड ग्रॅच्युईटीचे आलेले साडेतीन लाख रुपये आज माझ्या हाताशी आहेत. माझ्या कष्टाच्या पैशातून तिच्या औषधपाण्याचा खर्च करायचं समाधान खूप महत्त्वाचं आहे रे माझ्यासाठी. असं असताना तुम्ही देताय म्हणून तुमच्याकडून पैसे घेणं योग्य आहे कां तूच सांग. तुम्ही सगळीच भावंडं मला कधीच परकी नाही आहात. माझ्याजवळचे हेही पैसे संपतील तेव्हा इतर कुणापुढेही हात न पसरता मी पहिला निरोप तुलाच पाठवीन. मग तर झालं?विश्वास ठेव माझ्यावर. “

मी भारावल्यासारखा त्यांचा प्रत्येक शब्द न् शब्द मनात साठवत होतो. ते बोलायचे थांबले तसा मी भानावर आलो.

“नक्की.. ?”

“हो.. नक्की. वयाने लहान असूनही तुम्ही प्रेमानं, आपुलकीनं, सगळं करू पहाताहात हे खरंच खूप आहे आमच्यासाठी.. ” ते मनापासून म्हणाले. मला खूप बरं वाटलं. मनातली रुखरूख विरुन तर गेलीच आणि केशवरावांबद्दलचा आदर अधिकच दुणावला. परतीच्या प्रवासात याच विचारांची मला सोबत होती. विचार करता करता खूप उशीरा माझ्या लक्षात आलं की वरवर ‘हो’ म्हणत केशवराव पैसे घ्यायला नाहीच म्हणाले होते! तरीही त्या मागचा त्यांचा विचार आणि भावना खूप प्रामाणिक आणि निखळ होत्या. ताईच्या घरातली ही ‘श्रीमंती’ हाच तिचा भक्कम आधार रहाणार होता!

ज्या क्षणी हे नेमकेपणानं जाणवलं आणि माझ्याकडून स्वीकारलं गेलं त्या क्षणीच ताईला मदतीच्या रूपात कांही द्यायचा माझ्या मनातला अट्टाहास संपला. आता एकच इच्छा मनात होती, या जीवघेण्या दुखण्यातून माझी ताई पूर्ण बरी होऊन पुन्हा ते घर पूर्वीसारखं हसतखेळत रहावं. त्या ‘आनंदाच्या झाडा’ची पानगळ संपून त्याला पुन्हा नवी पालवी फुटावी. ताईच्या मनात तरी यापेक्षा वेगळं काय असणार होतं? आणि शिवाय तिच्याही मनात वेगळ्या रूपातला कां असेना पण ‘तो’ आहेच की. तिची कसोटी पहाणारा आणि ताई कसोटीला खरी उतरेल तेव्हा तिला जे हवं ते भरभरून देणारा! ताई खरंतर प्राप्त परिस्थितीला तोंड देत, असह्य यातना सहन करीत, या कसोटीला उतरण्याचा जीवापाड प्रयत्न करते आहेच की. ते फलद्रूप होतील? व्हायलाच हवेत…. ‘ मी भानावर आलो. ताईच्या मनांत आत्ता याक्षणी असेच उलटसुलट विचार येत असतील? ती काय मागत असेल तिच्या मनातल्या

‘त्या’च्याकडे?… परतीच्या त्या संपूर्ण प्रवासात मनात असे भरून राहिले होते ते ताईचेच विचार…. !!

तो प्रवास संपला तरी तिची विवंचना आणि काळजी पुढे बरेच दिवस मनात ठाण मांडून माझं मन पोखरत राहिली होती…. ‘तुझी ताई आता थोड्या दिवसांचीच सोबतीण आहे हे मी मनोमन स्वीकारलंय’… हे केशवरावांचे शब्द पुढे कितीतरी दिवस मनात रुतून बसले होते. कितीही सकारात्मक विचार करायचा म्हटलं तरी त्यांचे ते शब्द मन बेचैन करत रहायचे.

ताईला केमोचा तिसरा डोस देऊन झाल्याचं समजलं तेव्हा वाटलं आता प्रतिक्षा संपली. आता कांही दिवसातच तिचा पुढचा चेकअप होईल आणि ऑपरेशन करावे लागेल की नाही याचा निर्णयही. आम्ही सर्वजण त्या निर्णयाचीच वाट पहात होतो. आॅपरेशन करायचं म्हटलं तरी ती ते सहन करू शकेल कां याबद्दलची साशंकता डाॅक्टरांनी पूर्वी व्यक्त केली होतीच.. आणि ती.. नाही सहन करू शकली तर.. ? केशवराव म्हणाले तसा खरोखरच एखादा चमत्कार घडून ऑपरेशनची गरज न भासताच ताई बरी होईल कां? असेच सगळे उलटसुलट विचार मनाला व्यापून रहायचे. थोडी जरी उसंत मिळाली तरी आम्ही भावंडं आपापल्या सवडीने ताईला भेटून येत असू. त्या भेटीत माझ्या आईच्या मनातली घालमेल, केशवरावांच्या बोलण्यातली अगतिकता, अजित-सुजित दोघांच्याही

नजरेमधे जाणवत रहाणारी व्याकुळता,.. हे सगळंच माझं मन अस्वस्थ करणारं होतं!

अखेर ताईच्या संपूर्ण चेकअपची तारीख ठरली… , ऑपरेशनची गरज निर्माण न होताच ती बरी व्हावी असं सर्वांनाच अगदी मनापासून वाटत होतं.. , याच अस्वस्थ अनिश्चिततेत चार दिवस

कापरासारखे उडून गेले.. !

आता प्रतिक्षा होती ती फक्त तिकडून येणाऱ्या फोनची… आणि त्यादिवशी फोनचा रिंगटोन वाजताच तिकडचाच फोन असणार ही खात्री असल्यासारखा मी फोनकडे धावलो…

फोन तिकडचाच होता…. !

“मामा… मी अजित बोलतोय…. “

त्याच्या उत्तेजित झालेल्या स्वरांनी माझा थरकाप उडाला… त्याच्या आवाजातली थरथर मला स्पष्ट जाणवली आणि मी थिजून गेलो… त्याला ‘बोल’ म्हणायचं भानही मी हरवून बसलो. थरथरत्या हातातला रिसिव्हर कसाबसा सावरत मी तसाच उभा होतो.. !!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गा रे कोकीळा गा…☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ गा रे कोकीळा गा… ☆ सौ शालिनी जोशी

काकः कृष्णः पिकः कृष्णः को भेदः पिककाकयोः।

वसंतसमये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः ।।

कावळा काळा कोकीळ काळा मग कावळा आणि कोकीळ यात फरक कोणता? वसंत ऋतूत कावळा कावळाच असतो तर कोकीळ कोकीळच. वसंत ऋतूत कावळा काव काव करतो तर कोकीळ कुहू कुहू.

शाळेत पाठ केलेले हे सुभाषित आज आठवायला कारण म्हणजे सध्या ऐकायला येणारा कोकीळ आणि कोकिळेचा कलकलाट. दिड महिना वसंत ऋतू झाला तोपर्यंत सर्व शांत होते. पण अलीकडे आठ दिवस पहाटेपासून त्यांचे हाकारणे सुरू असते. कधी खूप लांब वर आवाज येतो. तर कधी अगदी जवळ. पण आज दोन कोकीळ आणि एक कोकिळा यांनी शेजारच्या आंब्याच्या झाडावरती भरपूर दंगा केला. थोडा वेळ शांत मग तिघेही एकदम इतका आवाज करत होते की कोकिळेचा आवाज कोणता आणि कोकिळाचा कोणता कळतच नव्हते. शेवटी कलकलाट करत ते उडून गेले. अशाप्रकारे कधी एकटा कोकीळ तर कधी कोकीळा तरकधी सर्वच एकदम आवाज करत असतात. पहाटे पासून दिवस मावळेपर्यंत हा खेळ सुरू असतो. हाच त्यांच्या वसंतोत्सव असावा.

कोकीळ हा कावळ्याच्या जातीतला पक्षी, कावळ्या सारखाच तुकतुकीत काळा रंग. पण शेपटी थोडी लांब आणि चोच फिकट रंगाची व थोडी वाकडी. डोळा मात्र चकचकीत लाल गोल मण्यासारखा, त्यावर एक काळा ठिपका. फार सुंदर दिसतो. कोकिळाबाईंचा रंग थोडासा तपकिरी काळा. शेपटीवर, पोटावर पांढरे पट्टे आणि अंगभर पांढरे ठिपके. संक्रांतीला पांढऱ्या खडीची काळी साडी नेसतात तसा थाट.

कोकिळेचा आवाज गोड असे आपण समजतो. म्हणून लता मंगेशकरला ‘ गानकोकिळा’ म्हणतात. पण प्रत्यक्षात कोकिळेचा आवाज रखरखीत घशातून ओढून ताणून काढलेला किक किक असा. आणि कोकीळ तिला साद देतो ती मात्र मंजूळ कुहू कुहू अशा आवाजात. पण मनात असेल तरच, कित्येक वेळा कोकिळा हाकारून दमते तरी सुद्धा प्रतिसाद येत नाही. तिचा आवाज चिडका झालेला जाणवतो. पण महाराज प्रसन्न होतील तेव्हा ना? सध्या त्यांचा विणीचा हंगाम असावा.

असे दांपत्य झाडावरती दाट पानात दिसते. जमिनीवर वावरताना दिसत नाही. किडे, अळ्या खाऊन पोट भरते. पण भलतेच आळशी. ‘ असावे घरकुल आपुले छान’ असे त्यांना कधीच वाटत नाही. छोटे छोटे पक्षीही जमेल तसे, ओबडधोबड का होईना, आपले घरटे बांधतात. पण येथे कोकिळाबाई कावळ्याच्या घरातच आपली अंडी ठेवून हिंडायला मोकळ्या. काही वेळा कावळ्याची अंडी खाली फेकायलाही कमी करत नाहीत. बिचारी कावळा कावळी पिल्लं उडायला लागेपर्यंत सांभाळतात. कारण अज्ञानामुळे त्याला फरक कळत नाही.

पूर्वीच्या काळी स्त्रिया कोकिळाव्रत करत असत. म्हणजे कोकिळेचा ओरडलेला आवाज ऐकल्याशिवाय जेवायचं नाही. किती विचित्र आहे नाही? मला वाटते आवाज ऐकण्यासाठी कोकिळेला पोपटासारखे पिंजऱ्यात बंदिस्त ही करत असावे.

कोकिळांचा झाडावरचा वावर इतक्या माझ्या बडबडीला कारण झाला.

एकंदरीत कोकीळ हा असा वैशिष्ट्यपूर्ण पक्षी. त्यामुळे साहित्यात, काव्यात स्थान. पण एरवी वर्षभर त्याचा आवाज, अस्तित्व काही कळतच नाही. म्हणूनच ‘वसंताच्या आगमनी कोकीळ गाई मंजुळ गाणी’.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हे श्रीरामा… हे सीते… ☆ डाॅ. मधुवंती दिलीप कुलकर्णी ☆

डाॅ. मधुवंती दिलीप कुलकर्णी

 🌸 विविधा 🌸

☆ हे श्रीरामा… हे सीते… ☆ डाॅ. मधुवंती दिलीप कुलकर्णी ☆

हे श्रीरामा, वयाच्या चौदाव्या वर्षांपर्यंत तुला लाभलेले आयुष्य हे पूर्णपणे संस्कारांनी भरलेले होते. लहानपणी तू चंद्र खेळायला मागीतलास. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी राजा, तिन्ही राण्या, दास दासी झटत होते. कोणतीही वस्तू तुला खेळायला मिळाली. वात्सल्यामध्ये, प्रेमामध्ये तू न्हाऊन निघालास. पुढे वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात जाऊन तत्त्वांनी भारलेले प्रशिक्षण, जीवन तू जगलास. गुरूकडून मनाचा परखडपणा शिकलास. भावनांना आवर घालून स्पष्टवक्तेपणा कसा अंगी बाणवायचा हे त्यांनी तुला शिकविले. समाजहितासाठी दुसर्याच्या वैगुण्याबद्दल संतोष न बाळगता लोकांसाठी वंद्य गोष्टी करण्याची वृत्ती तू तेथे आत्मसात केलीस म्हणून तुला वालीवध आत्मविश्वासाने करता आला. मारूतीरायासारख्या भक्ताचा आदर्श तू समाजापुढे ठेवलास म्हणूनच समर्थ रामदासांनी उत्स्फूर्तपणे मंदिरे स्थापन करून समाजातील युवामन घडविले.

जनी निंद्य ते सर्व सोडोनि द्यावे|जनी वंद्य ते सर्व भावे करावे||

हे सर्वांच्या मनात रूजविले. मनातील सर्व शंकांचे निरसन वसिष्ठ मुनींच्या कडून करून घेऊनच तू घरी आलास. आल्यावरही लग्न होईपर्यंत राजकुमाराचे कोडकौतुकात वाढलास. शिक्षणामुळे, गुरू सेवेमुळे कौशल्य आणि अध्यात्मिक वृत्तीमुळे तू आदर्श व्यक्ती बनलास. सीतेसारखी पत्नी तुला मिळाली. तिने आयुष्यभर तुझी साथ सोडली नाही. बालपणीच्या कालखंडात तुला निरीक्षणातून विचार करता आला.. तुला निवांतपणे सर्व शिकता आले. आदर्शवत अशा बर्याच व्यक्ती तुझ्या आसपास होत्या. म्हणून तू मर्यादा पुरुषोत्तम, एकवचनी, एकपत्नी, एकबाणी झालास. तू होतासच शूर, करारी आणि चारित्र्यसंपन्न. तुला राज्याभिषेक होण्यापूर्वी वनवासाला जावे लागले. तिथूनपुढे तू पुन्हा राजा होऊन रामराज्य येईपर्यंत तुझे आयुष्य कसोटीचे ठरले. वयाच्या चौदाव्या वर्षांपासून ते अठ्ठावीस वयापर्यंत वनवासात राहून, रावणवध करून तू परत आलास. तुझ्या आयुष्यातील सर्व यशाचे गमक तुझ्या लहानपणात आहे. हे सांगण्याचा उद्देश एवढाच की, सध्या चंद्रच काय सूर्य, मंगळ हाताशी आहेत मुलांना अनुभवायला.. विज्ञानाची आकाशझेप एवढी आहे की, धनुष्यबाण कालातीत झालं आहे. रॉकेट, पिस्तूल, बॉम्ब इ. चा वापर सर्रास सुरू आहे. तुला मिळालेले लहानपण सर्व मुलांना मिळते. भरमसाठ शिक्षण फी भरायला राजाराणी एका पायावर तयार असतात. असलेच पाहिजे. गुरूकुलाचा चांगलेपणा इमारती व भौतिक सुविधांवरच तर ठरतो. पण “वसिष्ठ” शोधावे लागतात. सत्य-असत्य, धर्म- अधर्म यांतील फरक समजावणारा वसिष्ठ मिळणे दुरापास्त. असलाच तर इथं इतका विचार कोण करणार जसा राजा दशरथाने केला. भविष्यकाळ उज्ज्वल होणं न होणं हे आर्थिक सुबत्तेवरच अवलंबून असतं. इथं वनवासात कोण जाणार? लाड करूनही योग्य शिकवण तुला दिली गेली. आता फक्त लाड करायला वेळ काढला जातो. ते महार लाड झाले तरी आवडून घ्यावं लागतं. कारण आर्थिक व नोकरीच्या कसरतीत वर्तमानातील वेळ हा विनात्रासात निघून गेला ना, चला आता उद्याचे उद्या यां सुटकेवर आधारित असतो. वर्तमानच जर असा भीषण तर भविष्य काळ पैशाच्या डोंगरावर बसून वाट्याला आलेला एकाकीपणा भोगण्यात जाईल. तू आणि सीता वेगवेगळ्या ठिकाणी रहात असलात तरी एकाकी नव्हतात हे कधी कळेल समाजाला.?

हे रामराया, रामराज्य आल्यावरही न्याय निवाडा करताना तू स्वतः च्या आयुष्यातील ऐशो आरामाचा विचार न करता लोकराज्याचा विचार करून सितेला वनवासात पाठविलेस. होय पाठविलेसच त्याशिवाय का तिने कष्टाने मुलांना योग्य ठिकाणी, योग्य माणसांच्यात वाढविल्यानंतर, लोकापवाद दूर झाल्यावर त्यांना तुझ्या हातात देऊन ती धरणी मातेच्या पोटात गडप झाली. तिचा अनुभवातून आलेला कणखर स्वभाव तेंव्हाच दिसला. तिच्याएवढा घराचा विचार करणारी स्त्री आता नाही निर्माण होणार. आश्रमात अत्यंत साधेपणाने राहून तिने मुलांना जन्माला घालणे आणि वाढविणे याला महत्त्व दिले. त्यामुळे रामराज्य येऊनही सिंहासनापेक्षा वरचढ असे स्थान मुलांनी समाजात निर्माण केले. रामासाठी मुले संपत्तीपेक्षा श्रेष्ठ ठरली. सध्या वनवासात जायला कोणती मुलगी तयार होईल? काही कारणाने गेलीच तर कोण मुलांना जन्म देईल? सध्या सीता एकट्या रामाला वनवासात जा म्हणते. महाल सोडवत नाही. घरातील कष्टाला भिते. नोकरीच्या ठिकाणी मात्र राबराब राबते. बॉसला गोड बोलून लांगूलचालन करणे हा नोकरी टिकण्याच्या पाया आहे. याव्यतरिक्त आणखी शक्ती जगात असतील यावर युवापिढीचा विश्वास नाही. समर्थांनी सांगितलेले अधिष्ठान पूर्णपणे विसरून गेलेल्या रामसीतांना “सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे | परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे|| हे कोण शिकवणार? हे श्रीरामा, तू ये आता.

त्यावेळचे सुनयना राणीचे संस्कार मोठ्यांच्या आशिर्वादात, पतीच्या विचारात संसार करण्याचे होते. सध्या सुनयनाचे लक्ष पतीला बाजूला ठेवून भौतिक आस शमविण्यासाठी बाह्य जगात कसे वावरावे या संस्कारांकडे जास्त आहे. त्यामुळे भविष्यात सीतांना कुठेही रामराया सापडणार नाही.

म्हणून हे रामराया, तू लोकोद्धारासाठी पुन्हा जन्म घेच पण हे सीते, हे सुनयना तुम्ही मुलींना संसारात आदर्श दाखविण्यासाठी पुन्हा जन्माला या. पुन्हा समाजाचं भलं करा.

हे सीते, तू वनवासात गेलीस तरी किती सुखी होतीस, समाधानी होतीस हे सांगण्याची वेळ कलीयुगात आली आहेस. तू काटक्या गोळा करून संसार केला असशील पण रामाचे तुला मिळालेले प्रेम, त्या प्रेमाच्या जोरावर ताठ मानेने उभी राहिलेली तू, त्यामुळे वाल्मिकी ॠषींच्या आश्रमात ही आनंदी असणारी तू कुणाला कशी कळणार? सर्वांची आई होऊन सीतामाता झालीस. हे सर्व आता कोण सांगणार कुणाला? सर्व जगाचा वाईट अनुभव घेऊन नंतरच रामासमोर निस्तेज पणाने उभी रहाणारी सीता तुला तरी बघवेल का गं? म्हणून तुझी आज गरज आहे. खरंच तुझी गरज आहे.

हे रामा…… हे सीते…… तुम्हां दोघांची आज खरंच गरज आहे.

भले शर्ट, पॅन्ट, हॅट, गॉगल घालून या. हातात लॅपटॉप चे शस्त्र असू द्या. चारचाकीतून या. पण तुमची मने रामसीतेची घेऊन या. युवापिढी वाट पहात आहे… 🙏🙏

© डाॅ. मधुवंती दिलीप कुलकर्णी

जि.सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन – सुश्री ज्योत्स्ना तानवडे – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सुश्री ज्योत्स्ना तानवडे

💐 अ भि नं द न 💐

आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ. ज्योत्स्ना तावडे यांचा *आनंदाच्या वाटेवर* हा ललित लेख संग्रह पुणे येथे नुकताच प्रकाशित झाला आहे. या नव्या पुस्तक प्रकाशनाबद्दल ई अभिव्यक्ती परिवारातर्फे त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !

आज त्यांचा लेख “विसाव्याचा थांबा” प्रकाशित करीत आहोत.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

? विविधा ?

☆ “विसाव्याचा थांबा” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

” कुहू ऽऽ कुहू ऽऽ ” कोकीळेची साद ऐकू आली. जणू वसंताच्या आगमनाची वर्दीच दिली गेली. आता वातावरणात फरक पडत जातो‌. हळूहळू थंडीचा कडाका कमी होत जाऊन दिवसाची उब वाढायला सुरुवात होते. उन्हाळी कामांची लगबग सुरु होते.

दरवर्षी शाळेच्या परीक्षेचा शेवटचा पेपर होतो आणि उन्हाळ्याच्या मोठ्या सुट्टीला आरंभ होतो. तसे तर सुट्टीचे वेध परीक्षेच्या आधीपासूनच लागलेले असतात. सुट्टीतल्या धमाल मस्तीचे बेतही तयार असतात. एक काळ असा होता की, ‘ सुट्टी आणि मामाचा गाव’ यांचं अतूट समीकरणच होतं. मामाकडे मामे – मावस भावंडांचा मेळावा जमायचा तर स्वतःच्या घरात चुलत – आत्ये भावंड जमा व्हायची. सुट्टीतलं जणू शिबिर सुरू व्हायचं. एकत्र गप्पा, गोष्टी, गाणी यांची धमाल व्हायची. वस्तूंची देवाणघेवाण, गोष्टी वाटून घेणे, एकमेकाला समजून घेणे, न भांडता रागावर ताबा मिळवणे अशा कितीतरी गोष्टी आपोआप शिकल्या जायच्या. नव्या गोष्टी बनवायला शिकायचो. भातुकलीची तर मजा औरच असायची. शेवटी कला सादरीकरणाला घरचेच व्यासपीठ मिळायचे‌. सभाधीटपणा यायचा. आता या सर्व गोष्टींच्या आठवणी सुद्धा खूप आनंद देतात. किती छान होते ते दिवस. या एकत्रित रहाण्याने मजा तर यायचीच पण नाती आणखी घट्ट व्हायची.

पण आता काळ बदलला. सामाजिक परिस्थिती बदलली. कुटुंब दुरावली. तशी सुट्टीतली ती मजा सुध्दा संपली. आता सुट्टीचे वेगळेच बेत सुरु होतात. लहान मोठ्या मुलांसाठी सुट्टीत वेगवेगळी शिबिरं भरवली जातात. वेगवेगळ्या कार्यशाळांचे आयोजन केले जाते. आज-काल बरेच जण पर्यटनाला प्राधान्य देत आहेत. कारण आजचे जीवनमान खूप धावपळीचं झालेले आहे. एकत्र येत पुन्हा जवळीक साधणे अनेक दृष्टीने अवघड आणि गैरसोयीचे झालेले आहे. अशावेळी या पर्यटनाचा मात्र छान उपयोग होतो आहे. पुन्हा सर्वांनी एकत्र येणं या गोष्टीची जाणीव कोव्हिडच्या काळामध्ये जास्त तीव्रतेने झाली. ट्रिपच्या निमित्ताने एकत्र येण्याचा आम्ही कुटुंबीयांनी खूप छान अनुभव घेतलेला आहे.

जागतिक महामारीने वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन शाळा, लॉक डाऊन, आयसोलेशन, खा- प्या- खेळा पण सगळं काही घरातूनच या गोष्टीचा अतिशय भयावह अनुभव अकल्पितपणे घ्यावा लागला. लहान-मोठे सगळेजणच यामुळे त्रासले, वैतागले होते. या मनस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सर्वांनी मिळून कुठेतरी चार दिवस ट्रीपला बाहेर जावे असा विचार सुरू झाला.

कारण निर्बंध कमी झाले, बाहेरचे वातावरण सुधारले. पण मुलांच्या शाळा, अभ्यास, परीक्षा यांच्या ताणाने ते अगदी कंटाळले होते. तर मोठे लोक रोजची धावपळ, सकाळ, संध्याकाळ गर्दीतून प्रवास, कामाचा ताणतणाव, ताणलेले नातेसंबंध, कामाच्या ठिकाणचे दडपण अशा एकूण व्यस्त आणि तणावपूर्ण वातावरणाने अगदी थकून गेले होते. यापासून चार दिवस तरी सुटका मिळावी, थोडे स्वास्थ्य, निवांतपण अनुभवावं म्हणून पुणे ते हरिहरेश्वरचे नियोजन केले होते.

आम्ही घरचेच बारा जण गेलो होतो. हरिहरेश्वरला ‘भोसले वाडा’ हा बंगलाच बुक केला होता. चार बेडरूम्स, किचन, हॉल, गच्ची, अंगण असा प्रशस्त बंगला होता. गच्ची आणि हॉल मध्ये झोपाळे बांधलेले होते. त्यामुळे लहान-मोठे सर्वजण खुश होते. किचनही सुसज्ज होते. त्यामुळे चहा कॉफी मनाप्रमाणे घेण्याची मजा घेता आली.

बंगल्याजवळच्या आतल्या रस्त्याने सरळ समुद्रावर जाता येत होते. मुख्य गर्दीच्या किनाऱ्यापासून थोडेसे दूर स्वच्छ, निवांत, कसलीही वर्दळ नसलेला हा किनारा. सर्वांनी चार दिवस समुद्रात डुंबणे, पाण्यात खेळणे, ओल्या मातीत खेळणे, ओल्या वाळूतून पाण्यातून दूरवर चालणे याचा मनसोक्त आनंद घेतला. सूर्यास्ताचा आनंद तर अवर्णनीय होता.

एक दिवस ‘दिवे आगर’च्या गणेशाचे दर्शन घेतले. एक दिवस ‘बाणकोट’ हा किनाऱ्यावर टेहळणीसाठी बांधलेला छोटा गड बघीतला. बाणकोट म्हणजे सावित्री नदीच्या काठावर असलेल्या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्याची प्रमुख जागा होती. सावित्री नदीतील फेरी सेवा घेत आपल्या गाड्यांसह बोटीतून नदीच्या पलीकडे जाण्याचा अनुभव वेगळाच होता. एक दिवस ‘हरिहरेश्वर’ दर्शन आणि मंदिर प्रदक्षिणा केली. इथे स्थलदर्शन करताना काळजी घ्यावी लागली. उन्हाळा तीव्र असल्याने सकाळी आणि दुपारनंतर बाहेर जाणे आणि मधल्या वेळात बंगल्यावर खेळणे, विश्रांती असे नियोजन केले होते.

या जोडीला हापूस आंबे, उकडीचे मोदक, घावन, बिरड्याची उसळ अशा खास कोकणी पदार्थांबरोबर स्वादिष्ट नाष्टा, जेवण यांची मेजवानी होती. त्यामुळे चार दिवस स्वयंपाका पासून सुट्टी मिळाली. हॉल मध्ये फक्त एकच टी. व्ही होता. त्यामुळे सिरियल्स, बातम्या यांच्या भडीमारापासून चार-पाच दिवस अगदी शांततेत गेले. त्या ऐवजी सर्वांच्या गप्पा, जुन्या आठवणी यांना वेळ मिळाला. जोडीने कॅरम, पत्ते, बुद्धिबळ खेळण्याचा मनसोक्त आनंद घेतला. नातवंडेही त्यात आनंदाने सहभागी झाली होती.

या सगळ्यामध्ये एक अतिशय चांगली गोष्ट जर कोणती झाली असेल तर ती म्हणजे इथे असलेली इंटरनेटची ‘अवकृपा’. या गोष्टीचा मला मात्र खूप आनंद झाला.

एरवी पुण्यामध्ये सर्वांची उजाडल्यापासून फोनच्या तालावर धावपळ सुरू होते. नाचकामच म्हणा ना. ‘वर्क फ्रॉम होम ‘म्हणजे काय तर अखंड कानाला फोन चिकटलेला. कान दुखायला लागतो. डोकं कलकलायला लागतं. चिडचिड होते. त्यावरुन घरात वादावादी, गैरसमज, ताणतणाव वाढतात. घरादाराची शांतताच जाते. इथे मात्र वेगळाच अनुभव येत होता. एक दोघांचे फोन रेंज असल्याने चालू होते ते संपर्कासाठी, निरोपासाठी, बुकिंगसाठी उपयोगी पडत होते. पण इतर बहुतेकांचे फोन रेंज अभावी बंद होते. त्यामुळे हात आणि कानही रजेवर होते. मनही रजेचे निवांतपण मनसोक्त अनुभवत होते. आम्हालाही एरवी कामात बुडालेल्या मुलांचा विनाव्यत्यय पूर्णवेळ सहवास मिळत होता. आम्हा दोघा जेष्ठांसाठी ही ट्रिपची खास कमाई होती.

आयटी क्षेत्राने सर्वच क्षेत्रात आज-काल अक्षरशः क्रांती केली आहे. सगळे जग इतके जवळ आले आहे की, शब्दशः घरात सामावले आहे. आयटी क्षेत्रातील नोकरीला तर काळ-वेळाचे नियम लावताच येत नाहीत. प्रत्येक देशाच्या वेळेनुसार रात्रंदिवस संपर्क, चर्चा, मीटिंग्ज सुरू असतात. त्यामुळे या नोकरीत शरीरावर, मनावर अक्षरशः अत्याचार होत असतात. शरीराचे नैसर्गिक चक्रच विस्कटले जाते. त्यामुळे शारीरिक व्याधी, मानसिक ताण-तणावांचे प्रमाण वाढलेले आहे. तो ताण कमी करण्यासाठी मधून मधून अशी पूर्ण विश्रांती घेणे अत्यावश्यक झाले आहे.

आपल्या रोजच्या सवयींपेक्षा वेगळ्या वातावरणात गेल्याने ही सवयींची साखळी लवकर तुटते. वेगळे ठिकाण, वेगळे वातावरण, वेगळी माणसे, वेगळ्या सोयीसुविधा यामुळे वेगवेगळे अनुभव येत असतात. काही घटक छान सुखद अनुभूती देतात. एखाद्या अनोख्या अनुभवाने ‘अरे व्वा, असे पण होऊ शकते !’ ही नव्याने जाणीव होते. तर निसर्गातल्या विविधतेने मन अचंबित होते. अशा भटकंतीने त्या त्या ठिकाणची नैसर्गिक वैशिष्ट्ये, खाद्यसंस्कृती, लोकपरंपरा यांची ओळख होते. मन आपोआप शांत होत गेलेले आपल्याला जाणवतही नाही. पण आपण मात्र हासत खिदळत, गाणी म्हणत, गप्पा मारत निवांत फिरत असतो एवढे मात्र खरे.

यासाठी मधून मधून असे छोटे छोटे ब्रेक किंवा ‘विसाव्याचे थांबे’ घेणे अतिशय गरजेचे असते. त्यासाठी फार प्रसिद्ध ठिकाणे मात्र नसावीत. कारण पुन्हा तिथेही गर्दी, रांगा लावणे, वेळेच बंधन यामुळे धावाधाव, ताणतणाव येतोच. तुलनेने थोडीशी छोटी अशी ही ठिकाणे मात्र यादृष्टीने खूपच सोईची असतात.

इथे मुख्य म्हणजे मनाला विश्रांती मिळते. जिवलगांशी सुसंवाद होतो. सगळे ताण, गैरसमज विसरून नाती जवळ येतात. निसर्गाचे सान्निध्य अनुभवायला मिळते. खूप काही शिकायला मिळते. काही गोष्टी नव्याने समजतात. आत्मपरिक्षण केले तर चुका लक्षात येतात. मग त्या सुधारायची संधीही मिळते. शेवटी रोजचा जीवन संघर्ष करायचा तो काय फक्त पैसे मिळवण्यासाठी ? नाही! तर कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी, सगळ्यांच्याच आनंदासाठी. तेव्हा रोज धावणाऱ्या प्रवाशांना विश्रांती हवीच ना! त्यामुळे थकलेली गाडी पुन्हा नव्या दमाने रुळावर येते. नवीन ऊर्जा, नवा उत्साह, नवी उमेद, नवे विचार, नव्या योजना घेऊन येते. त्यासाठी मनाला ताजेतवाने बनवणारे असे थांबे घ्यायलाच हवेत.

निसर्गाचे अद्भुत विश्व डोळे भरून पहायला, अनुभवायला हवे. मग मन आपोआप गायला लागते,

या जन्मावर या जगण्यावर

शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे !

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ संपादकीय निवेदन ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

‘सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

💐 संपादकीय निवेदन 💐

💐 अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन! 💐

आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ. उज्वला सहस्रबुद्धे यांचा  ‘कवडसे’ हा लेख संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.हे त्यांचे तिसरे पुस्तक आहे.त्यांच्या या साहित्यिक वाटचालीबद्दल ई अभिव्यक्ती परिवारातर्फे मन: पूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा   !

 

– आजच्या अंकात वाचूया त्यांचे एक पुरस्कारप्राप्त आलेख – “कवडसे…”

– संपादक मंडळ

ई – अभिव्यक्ती, मराठी विभाग

🔅 विविधा 🔅

☆ कवडसे ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

गेले पंधरा दिवस पावसाने अगदी धुमाकूळ घातला होता. जून मध्ये सात जूनला पावसाची थोडी सुरुवात तर झाली पण नंतर पाऊस  गायब झाला.  जवळपास एक दोन नक्षत्रे पावसाने हुलकावणी दिली पण नंतर गणपती बाप्पा आले तेच मुळी पाऊस घेऊन! मग काय सर्वांनाच खुशी झाली. पाऊस पाणी चांगलं झालं तरच शेत पिकणार आणि पावसाची नऊ नक्षत्र अशी नवरात्रीपर्यंत पडली की  पीक पाणी चांगले येणार.. त्यावेळी नवरात्रात येणारे  उन्हाचे कवडसे आपल्याला मनापासून आनंद देतात!

आज खूप दिवसांनी खिडकीतून उन्हाचा कवडसा घरात आला आणि त्याच्या सोनेरी उबेत घराचा कोपरा न् कोपरा सुखावला! बाहेरची सुंद, ढगाळ हवेने इतके दिवस आलेली मरगळ त्या एका कवडशाने घालवून टाकली! खरंच हा सूर्य नसता तर..!

लहानपणी आपण असे निबंध लिहीत असू. सूर्य, पाऊस, हवा, वातावरण यातील काहीही नसतं तर आपलं जीवन कसं वैराण झालं असते याची कल्पनाच करवत नाही!

उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतूंचे चक्र फिरत राहते, तेव्हा कुठे सूर्याचे फिरणं आपल्या लक्षात येतं! पृथ्वीच्या गतिशीलतेमुळे हे ऋतू आपण उपभोगतो .या प्रत्येक ऋतूचा आपण अनुभव घेत असतो. एका ऋतू नंतर दुसरा ऋतू सुरू होताना नकळत त्याचा कवडसा त्यात डोकावत असतो. पाऊस संपून हिवाळ्याची चाहूल लागते तेव्हा हळूहळू ऋतू बदलाचा कवडसा दिसू लागतो. ऋतू बदलताना ती काही आखीव रेखीव गोष्ट नसते की, एका विशिष्ट तारखेला हा ऋतू संपेल, आणि दुसरा ऋतू येईल! तर हा बदल होतो अलगदपणे! एका ऋतूतून दुसऱ्या ऋतूत जाताना  त्या दोन्ही ऋतूंची सरमिसळ होत असते.त्यांची एकमेकात मिसळण्याची प्रक्रिया चालू असते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अलीकडे या गोष्टी आपल्याला बऱ्यापैकी आधी कळतात ही गोष्ट अलहिदा! तरीही एखाद्या वेळी अचानक येणारे वादळ या अंदाजावर पाणी फिरवते! असे हे ऋतूंचे चक्र आपल्याला त्यातील असंख्य धुली कणांच्या रूपात सतत दिसून येत असते.

जेव्हा घरात उन्हाचा कवडसा डोकावतो, तेव्हा आपल्याला त्या कवडशात दिसणारे असंख्य धुलीकण वेगवेगळ्या गोष्टींची आठवण करून देत असतात!

तसेच जीवनात येणारे चांगले वाईट असे विविध प्रसंग हे आपल्या आशेने भरलेल्या मनाचे प्रतिक आहे! खूप निराशा, खूप दुःख जेव्हा वाट्याला आलेले असते  तेव्हा नकळतच कुठेतरी आशेचा कवडसा  दूरवर दिसत असतो. नुकतीच घडलेली एक घटना.. माझी पुतणी कॅन्सरच्या आजाराने मृत्यूला सामोरे गेली. खूप वाईट वाटले.. असं वाटलं, परमेश्वर इतका का दुष्ट आहे की त्या तरुण मुलीला मृत्यू यावा! जिचे आता उमेदीचे वय होतं. संसारात जोडीदाराबरोबर उपभोगायचं वय होतं, ते सगळं टाकून तिला हा संसाराचा सारीपाट  अकाली उधळून टाकून जावे लागले! सगळेच अनाकलनीय होतं! इतक्या दुःखद प्रसंगा नंतर हळूहळू त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय, तेव्हा नवीन बातमीचा कवडसा आम्हाला दिसू लागला! तिची बहीण प्रेग्नेंट आहे असे कळले, पुन्हा एक नवीन जीव आपल्याला आनंद देण्यासाठी जन्माला येणार आहे, नकळतच त्या बातमीने मन व्यापून टाकले. मनाचा गाभारा उजळून गेला नुसत्या आशादायक  विचाराने! हाच तो कवडसा खूप मोठ्या तेजोवलयाचा भाग असतो! असंच काहीसं या कवडशात दिसत रहातं  ते गेलेल्या गोष्टींचं अस्तित्व!

लहानपणी काचा कवड्या  खेळताना कधी मनासारखं दान पडे तर कधी नाही! पण म्हणून काही त्यातलं यश- अपयश मनाला  लावून घेऊन खेळणं कधी कोणी सोडत का?

अशीच एका जवळच्या नात्यातली गोष्ट! त्या मुलीच्या नवऱ्याचा एक्सीडेंट होतो आणि कित्येक महिने त्याला हॉस्पिटलायझेशन करावे लागते. त्या मुलीला दोन लहान मुली असतात. शिक्षण पदवीपर्यंत झालेले असते. नवरा आजारी, घरात मिळवते कोणीच नाही, अशावेळी ती मनाने खचून गेलेली असते…., पण अचानक तिने  एका नोकरीच्या  ठिकाणी अर्ज केला होता तिथून नोकरीचा कॉल येतो. ती मुलाखत योग्य तऱ्हेने देते, तीन महिने तिला ट्रेनिंग असते.. लहान दोन मुली पदरात.. पण सर्वांनी तेव्हा तिची अडचण काढली. तिने ट्रेनिंग पूर्ण केले आणि कामावर जॉईन झाली.. हा किती सुंदर सोनेरी कवडसा तिच्या जीवनात आला! पुढे तिने दोन्ही मुलींना चांगले शिकवले. तिचा नवराही बऱ्यापैकी ठीक झाला. एक जीवन मार्गाला लागले. असे हे कवडसे प्रत्येकाच्या आयुष्यात संकट प्रसंगी येत असतात, पण त्या  संकटांना न घाबरता ती संधी म्हणून त्याचा लाभ घेता आला पाहिजे! कवडसा हा आशादायी असतो. तो कुठूनही कसाही आला तरी त्यातील धुलिकण न बघता त्याचे तेज पाहिले पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे.. तरच आपल्या जीवनाचे सार्थक होईल, अशा या कवडशावर माझा विश्वास आहे. पुढे पूर्ण अंध:कार आहे असं भवितव्य कधीच नसतं! तर दयाळू परमेश्वर एक तरी झरोका असा देतो की तिथून हा  कवडसा आपल्या आयुष्यात डोकावतो आणि आपला जीवन प्रवास सुकर करण्यासाठी आशावादी ठेवतो….

रोज दिसतो एक कवडसा,

मनात माझ्या आशेचा !

विरतील निराश ढग मनातून,

येईल उत्साह जगण्याचा!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महाराष्ट्रातील संत स्त्रिया – भाग – ५ – संत कान्होपात्रा…☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ महाराष्ट्रातील संत स्त्रिया – भाग – ५ – संत कान्होपात्रा… ☆ सौ शालिनी जोशी

पंढरपूर जवळील मंगळवेढा हे संतांच गाव. संत दामाजी, संत चोखामेळा या मंगळवेढ्याचे होते. येथेच १५ व्या शतकात शामा गणिकेचे पोटी कान्होपात्रेचा जन्म झाला. चिखलात उमललेले कमळच हे. अप्रतिम लावण्य आणि गोड गळा तिला लाभला होता. साहजिकच आपलेच काम आपल्या मुलीने करावे अशी तिच्या आईची इच्छा होती. पण पूर्व पुण्याईने कान्होपात्रेला लहानपणापासूनच विठ्ठलाची ओढ होती. तिला नृत्य, गायन शिकवणारे गुरुजीही भजने शिकवत असत. त्यामुळे सतत हरिनामात दंग राहणे हाच तिचा छंद झाला. सौंदर्यामुळे मोठमोठ्या सावकारांच्या तिला मागण्या येत असत, पण ती नकार देत असे. त्यामुळे तिचा छळही झाला.

शामा नायकिणीने चिडून तिला अंधाऱ्या खोलीत कोंडून ठेवले. पण विठ्ठलाच्या कृपेने तिच्यासाठी तो एकांत ठरला. ती अखंड नामस्मरणात गुंतली. एकादशीचा दिवस होता. वारकऱ्यांचे अभंग ऐकून तिला स्वस्त बसवेना. तिने खिडकीतून उडी मारली आणि वेश बदलून वारीत सामील झाली. हातात वीणा घेऊन वारकऱ्यांबरोबर पंढरीला पोहोचली. चंद्रभागेत स्नान करून, नामदेव पायरीचे दर्शन, घेऊन राऊळी धावली. देहभान विसरून, विठ्ठलाचे अनुपम रूप तिने डोळ्यात साठवले. चरणाला मिठी मारली. नामभक्ती सांगताना ती म्हणते,

घ्यारे घ्यारे मुखी नाम l अंतरी धरोनिया प्रेम ll

माझा आहे भोळा बाप lघेतो ताप हरोनी ll

कान्होपात्रीने मंगळवेढ्याहून पंढरपूरला दर्शनासाठी येण्याचे धाडस केले. ती परत मंगळवेढाला गेली नाही. उलट तीच विठुरायाला प्रश्न करते,

‘पतित पावन म्हणविसी आधी l

मग भक्ता मागे उपाधी कां बरे लावतो?ll’

नामस्मरणातून सुरू झालेल्या कान्होपात्रेचा प्रवास अनुभूती पर्यंत पोहोचला. पांडुरंगाच्या चरणी ती आनंदाने विसावली. कान्होपात्राचे अप्रतिम सौंदर्य बिदरच्या बादशहाच्या कानावर गेले होते. ती लावण्यवती आपली अंकित असावी, अशी ईर्षा बादशहाच्या मनात निर्माण झाली. कान्होपात्रा पंढरपूरला आहे हे कळतात तिला नेण्यासाठी बादशहाचे शिपाई आले. कान्होने मंदिराचा आश्रय घेतला. सरदार शिपायानी मंदिरापर्यंत तिचा पाठलाग केला. मंदिराच्या व्यवस्थापकांना मंदिर ताब्यात घेण्याची धमकी दिली. तेव्हा मंदिर उध्वस्त होण्यापेक्षा मी यवनांसोबत जाते. अशी तयारी कान्होपात्रेने दर्शविली. आणि शेवटचे म्हणून विठ्ठलाच्या चरणावरती डोके ठेवले. तिच्या शुद्ध, अनन्य भावभक्तीला भगवंत पावला. तिची आळवणी ऐकून तिला सगुण रूपात दर्शन दिले. निर्भय केले. पाहता पाहता कान्होपात्रा अदृश्य झाली. दोन चैतन्ये एक झाली. उरले ते शुष्क कलेवर. भक्तीत अडसर आणणाऱ्या यवनाला हात हलवत जावे लागले. त्याप्रसंगी तिने केलेला विठ्ठलाचा धावा,

नको देवराया अंत आता पाहू l प्राण हा सर्वथा जाऊ पाहेll१ll

हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले l मजलागी झाले तैसे देवा ll२ll

मोकलून आस झाले उदास l घेई कान्होपात्रेस हृदयांतरी ll३ll.

तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी l धावे हो जननी विठाबाई ll ४ll

आपल्या अनन्य भक्ताची आळवणी भगवंतापर्यंत पोहोचली. भगवंताने आपले ब्रीद खरे केले. पंढरपूरच्या मंदिराच्या दक्षिण दरवाजात तिला पुरण्यात आले. तेथे एक तरटीचा वृक्ष उगवला. कानोपात्रीच्या भक्तीची व संतत्वाची ग्वाही तो देतो. त्या झाडाखाली तिची छोटीशी मूर्ती आहे. मंगळवेढा गावात तिचे छोटेसे देऊळ आहे.

अशाप्रकारे कान्होपात्रेचे आयुष्य अनेक नाट्यपूर्ण घटनांनी भरलेले होते. तिचा शेवटही तसाच थरारक. जन्मजात प्राप्त झालेले उपभोग्य म्हणून जगणे तिने नाकारले. तिने स्वतःची वारकरी संप्रदायातील स्त्रीभक्त, अभंग रचनाकार अशी नवी ओळख निर्माण केली. तिच्या नावे ३३ अभंग आहेत. वारकरी संप्रदायाने तिला मान दिला. कान्होजी संत कान्होपात्रा झाली. कुणी गुरु नाही, काही परंपरा नाही, भक्तीचे वातावरण नाही. तरीही केवळ भक्तीने तिने ईश्वराजवळ स्थान मिळवले. तोच तिचा सखा, मायबाप, बंधू, भगिनी आणि तारणहार झाला. ‘दिनोद्धार ऐसे वेदशास्त्रे गर्जती बाही’ दिनोद्धार करावा असे वेदच सांगतात. त्यामुळे मी कुळहीन असले तरी मला भक्तीचा अधिकार आहे. भक्ती मधून स्वतःचा उद्धार करावा असे वेदांत सांगितले आहे. अशी भूमिका घेऊन कान्होपात्रेने भक्ती करण्याचा अधिकार प्राप्त करून घेतला. पतीताना पावन करणाऱ्या विठ्ठलावर सर्व भाग टाकून निष्काम भावनेतून भक्ती केली. भक्तीचे बळ यवन बादशाहालाही कळलं.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रोमांचक असे काही… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

?  विविधा ?

☆ रोमांचक असे काही… ☆ सुश्री त्रिशला शहा 

निवांत क्षणी काही ऐकलेल्या, अनुभवलेल्या, पाहिलेल्या अनेक गोष्टी मनात खिळून रहातात, मनावर अगदी अधिराज्य गाजवतात. त्याचा आनंद, दुःख त्या गोष्टीवर अवलंबून असले तरी त्या परतपरत आठवतात. मनावर मोहिनी घालतात. कधीकधी मनाचा अगदी ताबा घेतात. अशाच उत्कंठा वाढवणाऱ्या, रोमांचित करणाऱ्या अनेक गाण्यांमध्ये आपण हरवून जातो. अशाच काही रोमांचक वाटणाऱ्या, मनच नव्हे तर देहभान हरवून टाकणाऱ्या, मन उल्हसित करणाऱ्या अनेक आठवणीत रमायला आपल्यालाही नक्कीचं आवडते. मंडळी, हा आठवणींचा खजिना उलगडत जाताना आपल्यालाही मनस्वी आनंद वाटल्याशिवाय रहाणार नाही.

भारतीय संगीत म्हणजे एक अतिशय भावनाप्रधान आणि मन मोहवून टाकणारे, पिढीजात चालत आलेले अजब रसायन आहे, मनातील आनंद, दुःख, प्रेम, विरह यातील कोणत्याही भावनेवर गाणे गाऊन त्याचे प्रकटीकरण केले जाते. मनातील भावनांचा कल्लोळ गाण्यांच्या माध्यमातून मांडताना अभिनयाचा कस लागतो. म्हणूनचं ते गाणे सर्वच द्रुष्टीन अजरामर ठरते. अशीच काही अप्रतिम अशी गाणी आपल्यालाही रोमांचित करुन जातातच आणि परतपरत ते गाणे ऐकताना तोच अनुभव येत रहातो. निव्वळ काही विशिष्ट जागांसाठी ते गाणे पुन्हापुन्हा ऐकावेसे वाटते, अगदी त्यात हरवून जायला होते. अशीच काही गाणी त्यांच्या शब्दांमुळे, चालीमुळे किंवा त्यातील उत्कंठ अभिनयामुळे, भावभावनेतील तरंगामुळे मनात घर करुन बसतात. अशाच उत्कंठावर्धक अशा काही गाण्यांबद्दल, त्याच्या सुमधूर चालींबद्दल, त्यातू़न अजरामर झालेल्या भूमिकेमध्ये आपणही त्यात किती समरसून जातो त्याविषयी;-

एक अनाडी असलेला नावाडी असा नायक आणि शिकलेली नायिका यांच्या प्रेमकथेतून साकारलेला, सुनील दत्त आणि नूतन यांच्या सजग अभिनयाने नटलेला सुंदर चित्रपट म्हणजे मिलन. यातील सर्वच गाणी अप्रतिम आहेतच, त्यातीलच अतिशय सुंदर असे गाणे म्हणजे सावन का महिना पवन करे सोर. या गाण्याची सुरवात म्हणजे नायक नायिकेला गाणे शिकवित असतो असा प्रसंग पण गाण्याच्या सुरवातीचे शब्द म्युझिक शिवाय येतात. ‘सावन का महिना, पवन करे सोर, जियरारे झुमे ऐसे जैसे बनमां$नाचे मोर. या  नाचे मोर या शब्दांवर पडणारी तबल्यावरची थाप ऐकताना अवघा देह कानात गोळा होतो आणि अंगावर रोमांच उभे रहातात जणू बनात आता मोरच नाचतोय कि काय असे वाटावे इतका सुरेखसा गाणे आणि वाद्यांचा मिलाफ साधलाय त्या संगीताच्या माधुर्यात आपणही रममाण होऊन जातो आणि लता – मुकेशच्या आवाजातील गाण्याचा मनापासून आनंद घेत रहातो. 

असाच छानसा परिणामकारक ठेका पडलाय देवदास या चित्रपटातील गाण्यात. माधुरी दिक्षीत, ऐश्वर्या रॉय आणि शाहरुख खान यांच्या दमदार अभिनयाने नटलेल्या या चित्रपटातील गाणीही त्यांच्या अविट चालींमुळे कर्णमधुर आहेत. या चित्रपटातील एका गाण्यात, प्रियकराची वाट पहात नायिका श्रुंगार करुन मैफिल सजवण्याच्या तयारीत असते पण प्रियकराच्या आगमनाशिवाय ती मैफिल खोळंबून ठेवते आणि त्याची चाहुल घेत असताना एकदम तो समोर दिसतो तेव्हा भावविभोर होऊन ती गाते, नाचते हमपें ये किसने हरा रंग डाला. रसिकहो यातील हम या शब्दावर पडणारी तबल्यावरची थाप केवळ अवर्णनीयच. हा ठेका आपल्याच काळजाचा ठोका चुकतोय कि काय, इतका परिणामकारक साधला गेलाय. इतका सुरेख मिलाफ या न्रुत्य, शब्द आणि वाद्यांचा साधलाय म्हणूनच तो नक्कीचं रोमांचकारी वाटतो. संगीतकाराच्या या कौशल्यपुर्ण ठेक्याला खरोखर मनपसंत दाद द्यावीशी वाटते. असाचं अतिशय मनोहारी, श्रवणीय नमुना म्हणजे गाईड या चित्रपटातील गाण्याचा. वहिदा रहेमान आणि देवानंद यांच्या बहारदार अभिनयाने परिपुर्ण असा, यातील असेच एक न्रुत्य संगीताचा सुरेख संगम साधणारे गीत म्हणजे पिया तोसे नैना लागे रे वहिदा रहेमानच्या अप्रतिम अशा न्रुत्याचा एक सुंदर आविष्कार. आपल्या लाडिक आवाजात ‘पिया तोसे नैना लागे रे’ असे म्हणताना वाद्यांचा सुरेखसा पीस वाजतो आणि त्या तालावर अतिशय लालित्यपूर्ण असे वहिदाचे न्रुत्य आणि लतादिदींचा मधुर आवाज यांचा डोळ्याचे पारणे फिटणारा मनोहारी संगम पहायला मिळतो तेव्हा आपण स्वतःला हरवून त्या रमणीय कलेचा आस्वाद घेतो तोच खरा रोमांचकारी क्षण. यावेळी वहिदाच्या अदा पाहू कि लतादिदींचा स्वर मनात साठवू की एस्. डी. बर्मन यांचे संगीत ऐकू, प्राधान्य कोणाला देऊ असा प्रश्न नक्कीच पडतो. भारतीय संगीताचा असा मिलाफ पहाण्याचा आनंद आगळाच.

जुन्या चित्रपटांपैकी संगीताभिनयाने सजलेला आणखी एक चित्रपट म्हणजे मीनाकुमारी, राजकुमार आणि राजेंद्रकुमार यांच्या सम्रुध्द अभिनयाने, लतादिदींच्या अविट गाण्यांमुळे रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेला दिल एक मंदिर. 

आजारपणामुळे जन्म-म्रुत्युच्या उंबरठ्यावर असलेल्या नायकाच्या जीवनातील ती रात्र. उद्याच्या ऑपरेशनमध्ये काय होईल याची चिंता, त्यामुळे मनात दाटलेले काहुर आणि अस्वस्थता दाखवणारी पतीपत्नीच्या जीवनातील तगमग वाढवणारी ती बैचैनीची रात्र. गतजीवनातील घालवलेले पत्नीसमवेतचे आनंदाचे क्षण आठवताना आपल्या पत्नीला परतत एकदा नववधूच्या रुपात पहाण्याची इच्छा तो बोलून दाखवतो तेव्हा मनात चाललेल्या वादळाला थोपवून धरुन नायिका यासाठी तयार होते. आजची रात्र फक्त आपल्या दोघांची आहे. उद्याचा विचारच नको या भावनेतून नायिका, मीनाकुमारी सारा साजश्रुंगार करुन नववधूच्या वेशात येते आणि खिडकी उघडून निरभ्र आकाशातील चंद्रमालाच म्हणते रुक जा रात ठहर जा रे चंदा, बिते ना मिलन की बेला. 

आपल्या मनातील भावनांचा कल्लोळ डोळ्यातून चेहऱ्यावरुन साकारणाऱ्या या अभिनेत्रीला पहाताना आपल्याही अंगावर रोमांच आल्याशिवाय रहात नाहीत. राजकुमार, मीनाकुमारीचा अतिशय दर्दभरा उत्कट प्रेमाचा अभिनय आणि त्याला साजेसा लतादिदींचा करुण स्वर हे सारेच अतुलनीय, अवर्णनीय.

शब्दप्रभू गजानन दिगंबर माडगूळकर म्हणजेच आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर. अनेक चित्रपट गीतांच्या माध्यमातून त्यांना आपण जाणत असलो तरी गीतरामायण या महाकाव्याची रचना करून त्यांनी मराठी माणसाच्या मनामनात अढळस्थान निर्माण केलयं. गदिमा आणि बाबुजी म्हणजेच सुधीर फडके यांच्या निर्मीतीतून साकारलेले गीतरामायण श्रवणीय, वंदनीयही आहेच. अनेक उपमा, अलंकारात्मक शब्दांची अक्षरशः उधळण करणारे गदिमा आणि अविट अशा चाली लावून स्वरबध्द करुन आकाशवाणीवर सादर करणारे बाबूजी यांची ही अजरामर कलाकृती. अनेक कलाकारांच्या माध्यमातून गायलं गेलेलं हे महाकाव्य जरासुद्धा कंटाळवाणे वाटत नाहीच उलट ते पुन्हापुन्हा ऐकावेसेच वाटते. गीतशब्दांची ही मोहिनी अनुपम्य अशीच आहे. म्हणूनचं गीतरामायणाच्या कार्यक्रमात कलाकारांकडून पहिलच गीत जेव्हा गायलं जात स्वये श्री रामप्रभू ऐकती कुशलव रामायण गाती या शब्दांबरोबर नकळतच श्रोते ठेका धरुन डोलायला लागतात आणि इथून पुढचे दोन तास या मैफिलीत आपण आकंठ बुडणार आहोत या जाणिवेतून मन रोमांचित झाल्याशिवाय रहात नाही. या अजोड आणि अनमोल कलाकृतीच्या माध्यमातून गदिमा आणि बाबूजी़नी एक महान ठेवा रसिकांसाठी निर्माण करुन ठेवलाय.

अनेक रागांवर आधारित असलेली ही आणि अशीच अनेकानेक गाणी चित्रपटांच्या, भावभक्ती गीतांच्या रुपाने आपण रोज ऐकतो, त्याला अभिनयाची जोड देऊन अनेक कलाकारांनी ती सम्रुध्द करुन ठेवलेली आहेत. त्यातून साकारलेल्या अशा कलाकृतींमुळे आपणही भावविभोर होऊन जातो. कान, डोळेच नव्हेतर अवघे तनमन रोमांचित करुन जातो हीच भारतीय संगीताची जादू म्हणता येईल यात शंकाच नाही. काल, आज आणि उद्याही या संगीताची जादू आपणा सर्वांच्या मनावर मोहिनी घालतच रहाणार आहे हे नक्कीच.

© सुश्री त्रिशला शहा

मिरज 

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares