मराठी साहित्य – विविधा ☆ “जागा…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “जागा…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

 जागा हि प्रत्येक गोष्टींची आणि आपलीच असते. शब्द एक आणि रुप अनेक.

राहण्याची असते. राबण्याची असते.

प्रवासात बसण्याची असते.

बाहेर गेल्यावर दुचाकी किंवा चारचाकी लावायची असते.

राजकारणात तर असतेच असते. पण. . . . कार्यक्रमात सुध्दा असते.

 जागा. . . . . . .

सर्वसामान्य लोकांसाठी यात जिव्हाळा आहे.

मित्र, नातेवाईक यांच्यासाठी आपुलकी आहे. तर. . . . . .

राजकारणात प्रतिष्ठा आहे.

राजकारणात मिळाली तर टिकवायची, आणि नाही मिळाली तर बळकवायची असा दोनसुत्री कार्यक्रम असतो. मग ती जागा मोक्याची किंवा धोक्याची कोणतीही असो.

राजकारणात जागेसाठी साम, दाम, दंड, भेद यांचा वापर सहज होतो. तर नात्यांमध्ये यांचा विचार गौण असतो. किंबहुना नसतोच.

जागा घेण्यासाठी संघर्ष असतो. तर  जागा सोडण्यासाठी तडजोड असते.

व्यक्तीचे वय, वागणं, विचार, आणि ज्ञान यानुसार तो जागा मिळवत असतो.

काही वेळा जागेमुळे माणसाला किंमत असते. तर काही वेळा माणसाला आपली जागा कोणती?. . . . याची किंमतच नसते.

आदराने आणि सन्मानाने बोलवून दिली जाते ती जागा. तर अपमान करुन दाखवली जाते ती सुद्धा जागाच.

गाण्यात असते, नाटकात असते. या जागा बरोबर घेतल्या तर दाद सुद्धा मिळते.

जागा, प्रेक्षणीय असते, पवित्र असते, शांत असते, आणि भयावह सुध्दा असते.

सुपीक असते, नापीक, आणि पडीक सुध्दा असते.

लहानपणी लपंडाव खेळताना आपण सापडूनये म्हणून, आणि आता बऱ्याच ठिकाणी अपराध केल्यावर पोलीसांनी पकडूनये म्हणून शोधली जाते ती जागा.

काही सुरक्षित असतात. तर काही आरक्षित. काही अतिक्रमण केलेल्या असतात, तर काही पुनर्वसन करण्यासाठी देऊ असं आश्वासन असतं. पण असतात जागा.

इतकच काय. . . . मेल्यानंतर सुध्दा नेतात ती सुध्दा एक ठराविक जागाच असते.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ निसर्ग, साधना आणि सामर्थ्य… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

?विविधा ?

☆ निसर्ग, साधना आणि सामर्थ्य… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

एखादी कल्पना सुद्धा कल्पकतेनेच कागदावर मांडताना वास्तवाच्या घटनेची गती वेगळ्या वळणाने वास्तवाचा हात न सोडता ज्याला अंतीम नैसर्गिक सत्यापर्यंत लिलया पोहोचवता येते तोच खरा साहित्यिक बनतो.

पाळलेले कबूतर अवकाशात उंच उंच गिरक्या मारताना नाविन्याचा शोध घेत नाही. किंवा कुठल्याही लक्षाचा वेध घेत नाही. कारण त्याला माहीत असतं आपल्या दाण्यापाण्यची व्यवस्था आपल्या मालकाने आपल्या खुराड्या जवळच करून ठेवली आहे.

पण गरूडाला गगनभरारी घेतच आपलं लक्ष निश्चित करून त्यावर झडप टाकून ते मिळवावं लागत. कारण त्याला पुन्हा निसर्गाच्या कुशीतच परतायच असतं आपलं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी म्हणूनच गरूड कबुतर, चिमणी वास्तवतेच्या वेगळ्या साच्यात आपला जीवनक्रम व्यतीत करताना आपापला प्रवर्ग वेगळा वेगळा आहे. हे ओळखून असतात त्यानी आपल्या वेगळ्या वेगळ्या तपसाधनेने वेगळी वेगळी सिद्धी साध्य केलेली असते. विधात्याने ही त्यांना तसेच घडवलेले असते.

हे नैसर्गिक सामर्थ्य आजपावेतो निसर्गाने कठोर साधना करणारानाच स्वखुशीने बहाल केले आहे. म्हणून साधना महत्वाची केवळ उसनवारी करून यातले काही साधता येत नाही. ऊर्जाश्रोत मुळात नैसर्गिक आहे. तो मिळवायला माणसाला निसर्गालाच शरण जावे लागते. स्तुतीचे भाडोत्री डोलारे भाडे थकताच पोबारा करतात आणि आपण उघडे पडलो आहोत याची जाणीव होते. म्हणून निसर्ग दत्त सामर्थ्य हेच अखेरचे वास्तदर्शी सत्य असते. 

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गीता जशी समजली तशी… भाग – ७ ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ गीता जशी समजली तशी… भाग – ७  – गीता — श्रीकृष्णाची वाङ्मय मूर्ती ☆ सौ शालिनी जोशी

मूर्ती ही एखाद्या व्यक्तीची प्रतिमा असते. तिला रंग, रूप, आकार असतो. त्यावरून त्या व्यक्तीचे बाह्य रूप समजू शकते. ती निर्जीव असते. आचार, विचार कळू शकत नाहीत. तेव्हा एखाद्या व्यक्तीने तिच्या वाणीने म्हणजे तिच्या शब्दांत सांगितलेले विचार म्हणजे त्या व्यक्तीची वाणीरूप मूर्ती. म्हणजे संत महात्म्यानी केलेला उपदेश, त्यांचे विचार ते गेले तरी ग्रंथ रूपाने लोकांपर्यंत पोहोचतात. म्हणून त्यांच्या ग्रंथांना त्यांची वाङ्मय मूर्ती म्हणतात. ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांची, आत्माराम- दासबोध समर्थांची आणि गाथा ही तुकारामांची वाङ्मम मूर्ती होय. म्हणून समर्थ रामदास शिष्यांना सांगतात, ‘ आत्माराम दासबोधl माझे स्वरूप स्वतः सिद्धll असता न करावा खेदl भक्तजनीll’ तर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीच्या शेवटी म्हणतात, ‘ पुढती पुढती पुढतीl इया ग्रंथ पुण्य संपत्तीll सर्व सुखी सर्व भूतीl संपूर्ण होईजोll’ (ज्ञा. १८/१८०९)

तशीच गीता ही श्रीकृष्णाची वाङ्मयमूर्ती. त्याविषयी सांगण्याचा हा प्रयत्न.

श्रीकृष्ण कौरव पांडवांच्या युद्ध प्रसंगी अर्जुनाचा सारथी म्हणून रणांगणावरती उतरले. युद्धात भाग घेणार नाही अशी प्रतिज्ञा. पण पांडवांच्या बाजूने त्यांनीच प्रथम पांचजन्य शंख फुंकला. आणि ते ऋषिकेश (इंद्रीयांचा स्वामी, ऋषिक- इंद्रिय) अर्जुनाच्या इंद्रियांचा स्वामी झाले. रणांगणावर नातेवाईकांना व गुरुना पाहून अर्जुनाला त्यांच्याविषयीच्या मोहाने ग्रासले. पापा पासूनचे विचार धर्मनाशापर्यंत पोहोचले. तरीही श्रीकृष्ण शांत होते. त्यांनी अर्जुनाचे म्हणणे ऐकून घेतले. अर्जुनाच्या हातातील धनुष्य गळून पडले. तो संन्यासाची भाषा बोलू लागला आणि शेवटी श्रीकृष्णाचे शिष्यत्व पत्करले. तेव्हा श्रीकृष्णानी आपले प्रयत्न सुरू केले. अर्जुनाची वीरश्री जागृत करायचा प्रयत्न केला. पण अर्जुन मोहरूपी चिखलात अधिकच रुतत आहे असे पाहून, असा मोहरुप रोग त्याला कधीच होऊ नये या दृष्टीने उपदेशाला सुरुवात केली. विचार केला, आचरण केले आणि मग सांगितले असा हा उपदेश.

आत्म्याचे अविनाशित्व, देहाची क्षणभंगूरता, स्वधर्माची अपरिहार्यता, क्षत्रियांचे कर्तव्य व जबाबदारी, निष्कामकर्माची महती अशा वरच्या वरच्या श्रेणीत उपदेश सुरू केला. लोकसंग्रहाचा विचार, यज्ञाच्या व संन्याशाच्या जुन्या कल्पनात बदल, ज्येष्ठांचे आचरण, निष्काम कर्म सांगून मी स्वतः असे आचरण करतो, दृष्टांच्या नाशासाठी व सज्जनांच्या रक्षणासाठी अवतार घेतो. असे सांगून आपला आदर्श त्याच्या पुढे ठेवला. हळूहळू आपल्या भगवंत रूपाची जाणीव करून दिली. निर्गुण निराकार असून जगाची उत्पत्ती, स्थिती, लय करणारा, भक्तांचा योगक्षेम चालविणारा, सृष्टीचे चक्र चालवणारा, सर्वांचे गंतव्य स्थान मीच आहे. सर्व व्यापकत्व स्पष्ट केले. विश्वरुप दाखवले. दैवी गुणांचे श्रेष्ठत्व पटवून दिले. स्थितप्रज्ञ, जीवनमुक्त, ज्ञानी भक्त यांचे आदर्श त्याच्या समोर ठेवले. त्यामुळे मोहाच्या पलीकडे जाऊन अर्जुन युद्धाला तयार झाला. तशी कबुली त्याने दिली. गीतोपदेशाचे सार्थक झाले. सर्वांसाठी सर्वकाळी अमर असा हा उपदेश, युद्धभूमीवर केवळ ४० मिनिटात श्रीकृष्णाने अर्जुनाला केला. आणि ‘यथेच्छसि तथा कुरु’ असे स्वातंत्र्य ही त्याला दिले.

आपल्याही जीवनात असे मोहाचे प्रसंग येत असतात खरं पाहता आपण सारे अर्जुन आहोत. तेव्हा प्रत्यक्ष श्रीकृष्ण आपल्यासमोर नसले तरी हृदयात आहेत, मार्ग दाखवण्यास सज्ज आहेत, त्यांची गीता समोर आहे. तिचा आधार घेऊन जीवनाचे सूत्र त्या श्रीकृष्णाच्या हाती देवून संकट मुक्त व्हावे. अशी ही गीता म्हणून भगवंतांची वाङ्मय मूर्ती होते. साधकाने जीवन कसे जगावे सांगणारी जीवन गीता.

शंकराचार्य गीता महात्म्यात म्हणतात, ‘ सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन:l पार्थो वत्स: सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्ll उपनिषद या गायी, श्रीकृष्ण हा दोहन करणारा गवळी, अर्जुन गीतामृत पिणारे वासरू. हा दृष्टांतच गीता ही श्रीकृष्णाची वाङ्मयमूर्ती आहे सांगायला पुरेसा आहे. गीता ही श्रीविष्णूच्या मुखकमलातून निघालेले शास्त्र आहे. त्यामुळे इतर शास्त्रांच्या अभ्यासाची गरज नाही. हेच सर्व शास्त्रांचे शास्त्र. खचलेल्या मनाला उभारणी देणारं, मन बुद्धीचा समन्वय साधणार मानसशास्त्र आहे. योग्य सात्विक आहार व त्याचे फायदे सांगणार आहारशास्त्र आहे. युक्त आहार, विहार, झोप आणि जागृती यांचे फायदे सांगणारे आचरण शास्त्र आहे. नेत्यांची जबाबदारी आणि समाजातील सर्व घटकांना त्यांची कर्तव्य सांगणारं, सर्व जाती, धर्म, स्त्रिया यांना समान लेखणारं समाजशास्त्र आहे. पंचभूतात्मक सृष्टीचे ज्ञान करून देणारे विज्ञान शास्त्र, ‘उतिष्ठ, युद्धस्व’ सांगून प्रसंगाला धैर्याने तोंड देण्यास सांगणारे विवेक शास्त्र आहे. तसेच सर्वाभूती ईश्वर सांगणारे समत्व शास्त्र आहे आणि सर्वात मुख्य म्हणजे आत्मज्ञान करून देणारं आत्मशास्त्र आहे. सर्व योगही कर्म, ज्ञान, भक्ती येथे एकोप्याने नांदतात. कारण व परिणाम सूत्र पद्धतीने मांडले आहेत. कोणतीही सक्ती नाही. अंधश्रद्धा नाही. पण शास्त्राप्रमाणे कर्तव्य करायचा आग्रह आहे. अर्जुनाचे दोष सांगण्याचा स्पष्टपणा आहे आणि स्वतःचे कर्तव्य ही सांगितले आहे. स्वतः केले, आचारले मग सांगितले असा हा उपदेश. अर्जुनाच्या मनात कधीही परत संभ्रम होऊ नये असा रामबाण उपाय. सर्व द्वंद्वातून मुक्त करून नराचा नारायण करणारा हा संवाद. वरवर प्रासंगिक वाटला तरी तसा नाही. सर्वकाली, सर्व जगाच्या कल्याणाचा आहे. श्रीकृष्ण योगेश्वर अर्जुनाचे निमित्त्य करून सर्व जगाचे साकडे फेडतात. कर्म बंधनात न अडकता कर्म करण्याची वेगळी दृष्टी जगाला देतात. कर्म हीच पूजा झाली. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीत म्हणतात, ‘म्हणौनि मज काहीl समर्थनी आता विषो नाही l गीता जाणा हे वाङ्मयीl श्रीमूर्ति प्रभूचीll (ज्ञा. १८/१६८४)

अशी ही गीता ५००० वर्षे झाली तरी तिचे महत्त्व कमी झाले नाही. सर्व काळी सर्व लोकांना ती मार्गदर्शक आहे. सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी आहे. मानवाच्या आयुष्यातील कसोटीच्या वेळी योग्य मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ म्हणजे भारताची वैचारिक संपत्तीच आहे. अन्यायाविरुद्ध लढण्याचे सामर्थ्य, धैर्य देणारी गीता हातात घेऊन अनेक क्रांतिकारकांनी प्राणांचे बलिदान केले. यशाची प्रेरणा देणारी तीच आहे. म्हणून अनेक खेळाडूही यशाचे कारण गीता सांगतात. कितीतरी विद्वान, तत्वज्ञानी, शास्त्रज्ञ गीतेचा अभ्यास करतात व केला आहे. देशी-परदेशी विद्वानांवर तिचा प्रभाव आहे. विविध भाषेत भाषांतर होत आहे. झाली आहेत. असे हे अध्यात्म प्रधान, नीतिशास्त्र भारताचा राष्ट्रीय ग्रंथ आहे. अभिमानाने गीता ग्रंथ आपण परदेशी पाहुण्यांना भेट देतो. पंतप्रधान मोदींनी ही पद्धत सुरू केली. कारण गीता ही प्रत्यक्ष भगवंताची वाङ्मयमूर्ती!

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ व्रतोपासना – १०. काय काय करावे ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

व्रतोपासना – १०. काय काय करावे ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

आतापर्यंत आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या. त्यात काय करू नये हे विशेषतः सांगितले होते. आज आपण काय करावे यावर लक्ष देऊया. या गोष्टी आपण रोजच आचरणात आणल्या तर त्याचा स्वतः सहित सर्वांनाच फायदा होणार आहे. उपनिषदामध्ये एक थोर वचन आहे. या विश्वातील वस्तुमात्र ईश्वराने व्यापलेले आहे. त्यामुळे त्यागपूर्वक (जीवनावश्यक) भोगाचा स्वीकार करावा. कोणत्याही धनाचा लोभ करू नये हा सिद्धांत म्हणजे भारतीय संस्कृतीचा पाया आहे. त्याग पूर्वक भोग आणि लोभाचा त्याग यामुळे आपले जीवन समृद्ध बनू शकते. त्यासाठी मनाचे सामर्थ्य वाढवावे लागते. आपल्या बलवंत मनाला अंतर्मुख बनवण्यासाठी व्रते फार महत्त्वाची असतात. व्रत म्हणजे निश्चयाने सतत अखंडपणे करायची कृती. त्यासाठी निष्ठा धैर्य सहनशीलता असे गुण असावे लागतात.

आत्ता पर्यंत आपण सोपी व्रते बघितली. आजही सहज अंगीकार करता येतील अशी व्रते बघू या. यात रोज आचरणात आणण्याची व्रते आहेत.

१) रोज व्यायाम करणे. ज्याला जो जमेल त्याने तशा पद्धतीने करणे. रोज प्राणायाम करणे.

२) रोज ध्यान करणे.

३) चेहेऱ्यावर एक स्मितहास्य कायम असावे. त्यामुळे बघणाऱ्या व्यक्तीला आनंद मिळतोच. पण याचा फायदा आपल्याला जास्त होतो. हसण्या मुळे शरीरात एंडॉरफिन नावाचा अंतस्त्राव स्त्रवू लागतो. तो पेनकिलरचे काम करतो.

४) कायम वर्तमानात रहावे. काल काय झाले हे आठवू नये.आणि उद्या काय होणार याचीही चिंता करु नये.

५) प्रत्येक घटना, व्यक्ती यातील सकारात्मकता शोधून त्याकडे लक्ष द्यावे. आणि सकारात्मक बोलावे.

५) जमेल तेवढे कोणत्याही स्क्रीन पासून लांब रहावे. आवश्यक तेवढाच वापर करावा.

६) सामाजिक संपर्क ठेवावा. त्यामुळे आपली मनस्थिती नक्कीच बदलते.

७) तुलना करण्या पासून लांब रहावे. कोणाचीच कोणाशी अगदी स्वतःची सुद्धा इतर कोणा बरोबर तुलना करू नये.

८) अपेक्षा फक्त स्वतःकडून ठेवावी. साधारणपणे अपेक्षा दुसऱ्या व्यक्ती कडून ठेवली जाते. आणि अपेक्षा या शब्दाला जोडून येणारा शब्द बहुतांशी भंग हा असतो. आणि अपेक्षा भंग झाला की त्याच्या बरोबर दुःख, मानसिक ताण येतोच.

९) शक्य तेवढा आनंद द्यावा. आपण जे जे दुसऱ्याला देतो ते आपल्याकडे कित्येक पटींनी परत येते. आनंद हवा असेल तर तो वाटावा. म्हणजे सगळेच आनंदी राहतील.

१०) महत्त्वाचे म्हणजे यातील जमतील तेवढी व्रते अंगीकारण्याचा प्रयत्न करावा.

 व्रते वैकल्ये कायमच असतात. फक्त त्या त्या काळानुसार त्यात बदल होत असतो. त्याप्रमाणे आजच्या काळाला अनुकूल व अनुरूप अशी काही व्रते सांगितली आहेत अर्थात हे माझे विचार आहेत. पण त्याचा फायदा मात्र नक्कीच आहे.

व्रतोपासना  एक ते दहा वाचल्याबद्दल धन्यवाद!

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “स्कूल तो बहुत सीख लिया, अब…” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? इंद्रधनुष्य ?

☆ “स्कूल तो बहुत सीख लिया, अब…” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

“स्कूल तो बहुत सीख लिया, कुछ दिन तो बिताये इन्सानियत सीखनें के लिए !”

काॅलेजात असताना गाडीची किल्ली हातात असणं म्हणजे चैन वाटायची. खिशात फारसे पैसेही नसायचे. अर्थात, खूप पैसे लागतही नसत. सगळीकडे सायकल दामटत फिरायचं आणि मिळेल ते खायचं, असं खूप भटकलो. 

मी सांगतोय तो काळ काही फार जुना नाहीय. पण तेव्हा स्वस्ताई जास्त होती की देणाऱ्यांचे हात मोठे होते, यात उजवं-डावं करणं कठीण आहे. 

रोज सकाळी ६ वाजता पर्वतीवर जायचा आमचा शिरस्ता. सदाशिव पेठेत राहत होतो, तिथून चालत निघायचं आणि थेट पर्वतीवरच जाऊन थांबायचं. सकाळच्या गारव्यात दोनदा पर्वती चढायची-उतरायची आणि मग पायथ्याला गरमागरम पोहे किंवा उपीट खाऊन चहा प्यायचा. दहा रूपयांत काम ओके..! एखाद्या दिवशी पैसे विसरले-बिसरले तर कुणी उपाशी जाऊ दिलं नाही आम्हांला. चहा-नाश्ता विकणारी तरी अशी कुठं श्रीमंती ऊतू जाणारी माणसं होती? शाळेत चार बुकं कमी शिकली असतील कदाचित, पण माणूसपणात मात्र तरबेज एकदम. 

दर रविवारी सिंहगड ठरलेला. पहाटे अंधारातच सायकलला टांग मारून सुटायचं, खडकवासल्यापाशी अर्धा-अर्धा कप चहा घ्यायचा. आतकरवाडीत सायकली लावून पायवाटेनं गडावर जायचं. एखाद्या मेटीवर थकून थांबलं आणि पाणी मागितलं तर नुसतं पाणी यायचं नाही. चमचाभर साखर यायची. ‘पोरांनो,चहा घ्या घोटभर’ अशी हक्काची ऑर्डर असायची. ‘पैसे किती?’ असं विचारल्यावर ‘मोठा साहेब होशील तेव्हा घेईन पैसे’ असं म्हणणारी माणसं..

गडावर पिठलं-भाकरी खायला बसावं आणि एकाच भाकरीत पान उचलायला जावं तर जमायचंच नाही. ‘एका भाकरीतच पोट कसं काय भरतंय तुमचं? खावा अजून येक भाकर’ असा आग्रह व्हायचा. कांदा बुक्कीनं फोडावा लागायचा. चुकून कच्ची मिरची दाताखाली आली की पाणी-पाणी व्हायचं. चुलीशी बसलेली बायका-माणसं लगोलग दह्याची वाडगी पुढं करायची. थंडगार ताक खरोखरच आत्मा शांत करायचं. पातेल्यात लावलेला भात हे प्रकरण चवीला अफलातूनच असतं, शिवाय पौष्टीकही. तेव्हा दह्या-ताकाचे पैसे मोजून घेत नसत. नेहमी गडावर येणाऱ्यांकडून तर नाहीच. 

गडावर सरबत विकणारा एक मित्र होता. दहावीत शाळा सोडलेला. पाच रूपयांना लिंबाचं सरबत विकायचा. चांगला दोस्ताना जमलेला. मग दोन-तीन-चार ग्लास सरबत पोटात गेलं तरी हा मात्र पाच रूपयेच घ्यायचा. का? तर ‘मित्र’ म्हणून..! मी त्याला एकदा विचारलं होतं, ‘किती कमाई होते रोजची?’ २००५ साली त्याचं उत्तर होतं, ‘रोजचे पंचवीस-तीस रूपये सुटत्यात आणि रविवारी चांगली कमाई हुती शंभर-सव्वाशे रूपये..!’ महिन्याकाठी हजार-दीड हजार रूपयांची मिळकत असणारा तो माझा मित्र मला दोन-दोन ग्लास सरबत फुकट का बरं देत असेल? 

गडावर एकवेळ मागाल तितकं ताक मिळेल पण पाणी मिळणार नाही अशी स्थिती होती. पाणी मर्यादीतच असायचं. वीजेचा पुरवठा अगदी नियमितपणे अनियमित. अशा स्थितीत पायात प्लास्टीकच्या चपला अडकवून हा दिवसभर गडावर फिरून सरबत विकायचा. संध्याकाळी खाली उतरायचा. कधी कधी त्याचा अंदाज चुकायचा अन् नुकसान व्हायचं. गडावर राबता नसला की, केलेलं सरबत वाया जायचं. दिवसही वाया जायचा, पायपीट व्हायची, पैसेही मिळायचे नाहीत आणि मालाचंही नुकसान ! मग त्याची फार चिडचिड व्हायची. पण, दोन-तीन तासांत गडी नाॅर्मल..! खिशात पैसे नव्हते, पण त्याच्याकडे दानत होती हे निश्चित. 

कलावंतीण-प्रबळगड सारख्या ट्रेकमध्ये किंवा वासोट्यासारख्या ट्रेकमध्ये आपले सगळे नखरे अक्षरश: हवेत विरून जातात. ‘कुठलंही द्या, कसलंही द्या, पण पाणी द्या’ अशी स्थिती होते तेव्हा गडावरच्या झोपड्यांचं महत्त्व समजतं. इतक्या दुर्गम ठिकाणी, जिथं दिवसाला पाच-पंचवीस माणसं येण्याचीसुद्धा शाश्वती नाही, अशा  ठिकाणी स्टाॅलसदृश दुकान मांडून बसायचं, हा केवळ व्यवसाय असेल असं वाटत नाही. त्याही पलिकडे काहीतरी असणार..! कैऱ्या, जांभळं, करवंदं, बोरं, पेरू, आवळे, काकड्या, दही, ताक, सरबतं,चहा अशा गोष्टी विकून त्यांना श्रीमंती येत असेल का? 

महाबळेश्वरमध्ये कुल्फी विकणं वेगळं आणि माहुलीसारख्या गडावर चहा-सरबत विकणं वेगळं.. पाण्याचं महत्व आपल्याला तेव्हाच समजतं जेव्हा घोटभर पाण्यासाठीसुद्धा प्रचंड तंगडतोड करावी लागते. खिशात भरपूर नोटा असूनही उपयोग नसतो, जवळ उरलेली दोन-चार पारले बिस्कीटंसुद्धा सोन्याच्या बिस्कीटांइतकीच मौल्यवान वाटायला लागतात. एरवी आपण या गोष्टींकडे ढुंकूनही पाहणार नाही. तिथं गेल्यावर आपल्याला याची जाणीव आपोआपच होते. 

सिंधुदुर्गाला जाण्यासाठी पाॅवर बोटी आहेत. पण जंजिऱ्याला जाण्यासाठी शिडाच्या बोटी आहेत. त्या वल्हवाव्या लागतात. ते शारीरिक कष्टाचं काम आहे. वाऱ्याचा अचूक अंदाज घ्यावा लागतो. ते कौशल्य ही माणसं कुठून आणि कशी शिकत असतील? समुद्रातून वाहतूक करण्याचा व्यवसाय करणं हे मुळीच सोपं काम नाही. पावसाळ्यात चार-पाच महिने जंजिरा पर्यटकांसाठी बंद केला जातो, तेव्हा ही माणसं काय करत असतील? याचा विचार आपण कधी करत नाही. ती माणसं शिकलेली नसतील पण, समुद्राच्या घडण्या-बिघडण्याचा अंदाज घेण्यात मात्र हे बहाद्दर निष्णात असतात. 

एखाद्या गडावर आपल्याला चहा २०₹, पोहे ३०₹, भजी ५०₹ असं दिसलं की ते फार महाग वाटतं. पण, जो गड चढताना स्वत:च्या पायातल्या बुटांचंसुद्धा ओझं वाटायला लागतं, तिथं ती माणसं हे खाण्या-पिण्याचं साहित्य किती कष्टानं वर नेत असतील, हे डोळे, बुद्धी आणि मनं उघडी ठेवून पहायला हवं. जिथं घोटभर पाणीसुद्धा पायथ्यापासून घागरी-कळशांतून आणावं लागतं, तिथं लोकं ‘३०-३०₹ घेता आणि पोह्यांवर साधी कोथिंबीर-लिंबाची फोडही देत नाही तुम्ही’ अशी तक्रार करतात, तेव्हा त्यांच्या बौद्धिक पातळीची मला कीव कराविशी वाटते. ‘शी, काय हा चहा.. यात आलं सुद्धा नाही आणि २०₹ घेतात. नुसती लूट आहे ही’ असं म्हणणारी माणसं काही कमी नाहीत. त्यांनी चार दिवस त्याच ठिकाणी राहून चहा विकून दाखवावा आणि मगच असली बडबड करावी, असं मला वाटतं.

आपल्याला तर स्वयंपाकघरातून घराच्या दारापर्यंतसुद्धा सिलिंडर उचलून नेणं जमत नाही आणि ती माणसं सिलिंडर्स डोक्यावर-खांद्यावर वाहून नेतात..! स्त्रीसक्षमीकरण म्हणजे काय असतं ते गडकोटांवर जाऊन पहावं, त्याचा अभ्यास करावा, त्यावर प्रबंध तयार करून परिषदांमध्ये वाचावेत. पद्मपुरस्कारांकरिता गडकोटांवर वर्षानुवर्षं पर्यटक, इतिहासप्रेमींना सेवा देणाऱ्या एकाचंही नाव आपल्यापैकी कुणालाही सुचवावंसं वाटलं नाही. हा आपल्या सगळ्यांच्याच अज्ञानाचा, अपुऱ्या माहितीचा, अक्षम्य दुर्लक्षाचा आणि जगण्यावागण्यातल्या ओतप्रोत भरलेल्या स्वार्थीपणाचाच परिपाक नव्हे का? नारीशक्ती सन्मानाकरिता महाराष्ट्रातल्या शेकडो गडकोटांवर वर्षानुवर्षं भाकरी खाऊ घालणाऱ्या अन् पाणी देणाऱ्या एकाही माऊलीचं नाव आपण सुचवू शकलो नाही, याची आपल्याला खंतच नव्हे तर लाजही वाटली पाहिजे. 

ही लोकं गडोगडी दिसतील. या माणसांकडे पहा जरा. व्यावहारिक जगतापासून पूर्ण लांब असलेली आणि जगण्यासाठी रोजची धडपड करणारी ही माणसं.. त्यांचा परिसर सोडून शहरांकडे गेलेली नाहीत. यांची घरंदारं कशी असतील? यांची मुलं-बाळं दिवसभर काय करत असतील? ती कोणत्या शाळेत जात असतील? असे अनेक प्रश्न पडल्यावाचून राहत नाहीत. दिवस उजाडल्यापासून ते मावळेपर्यंत घरापासून दूर डोंगरावर चौदा-पंधरा तास राबायचं, हे काम फार कठीण आहे. पण त्या बदल्यात त्यांना काय मिळतं? किती पैसे मिळतात? याचा जरा शोध घ्यायला हवा. शोधलंत तर निराळ्याच जगाचा शोध तुम्हांला लागेल.. 

मोबाईल फोन्स, इंटरनेट गेम्स, सोशल मीडीया, फुटकळ टीव्ही सीरीयल्स, रिॲलिटी शोज्, भुक्कड काॅमेडी शोज्, यांच्या विळख्यात अडकून आपण खरंखुरं जग पहायचं विसरूनच गेलो आहोत. त्यामुळेच, आपण कितीही संपन्न असलो तरीही आपल्याला ते कमीच वाटणार. आणखी मिळवण्याची लालसा कमी होणारच नाही. बहुतांश समस्यांचं मूळ हेच आहे. 

उन्हाळ्याच्या सुटीचा काळ ह्या निराळ्या जगाचा शोध घेण्यासाठी वापरायला हरकत नाही. बाहेर रखरखीत उन्हाळा पेटलेला असताना आपण घरात मस्त गार हवेत बसून ह्या माणसांविषयी चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. हे जग प्रत्यक्ष जाऊन, जवळून अनुभवायला हवं. जाणून घ्यायला हवं. शक्य तितकी मदत करायला हवी. माणसांमधल्या माणूसपणाचं हे संचित जपलं पाहिजे..! 

© श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ४२ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ४२ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- समीर जिवंत राहिला तरी कधीच बरा होणार नाही हे डॉ.देवधर यांनी मला अतिशय सौम्यपणे समजावून सांगितलेलं होतं. त्यावेळी त्यांच्या केबिनमधे माझ्याबरोबर आलेले माझे ब्रँचमॅनेजर घोरपडे साहेब होते फक्त. ही गोष्ट घरी किंवा इतर कुणालाच मी मुद्दाम सांगितलेली नव्हती. असं असताना हे लिलाताईला कसं समजलं? मला प्रश्न पडला.)

विशेष म्हणजे या प्रश्नाचं उत्तर मी कुणाला न विचारताच त्याच दिवशी मला परस्पर मिळणार होतं आणि माझ्या दुःखावर फुंकर घालत मला

दिलासाही देणार होतं हे त्या क्षणी मात्र मला माहित नव्हतं. सगळं घडलं ते योगायोगाने घडावं तसंच.

‘ समीर पृथ्वीवरील औषधाने बरा होण्याच्या पलिकडे गेल्यामुळे तो बरा होण्यासाठी देवाघरी गेलाय आणि बरा होऊन परत येणाराय ‘

हे लिलाताईच्या पत्रातील वाक्य पुत्रवियोगाच्या धक्क्यातून मला अलगद बाहेर घेऊन आल़ं होतं. ही अंतर्ज्ञानाची खूणगाठच होती जशीकांही! एका क्षणार्धात माझं पुत्रवियोगाचं दु:ख विरुनच गेलं एकदम…

“कुणाचं पत्र..?”

“लिलाताईचं. घे. बघ तरी काय लिहलंय? वाच”

ती न बोलता उठली. ‘चहा करते..’ म्हणत आत जाऊ लागली.

“आधी वाच तरी.. मग चहा कर.”

“सांत्वनाचंच पत्र असणार. काय करू वाचून? आपला समीर गेलाय हे कटू सत्य बदलणाराय कां?” तिचा आवाज भरून आला.

“हो बदलणाराय. बघशील तू. आधी वाच..मग तूही कबूल करशील.”

तिने ते पत्र घेतलं. वाचलं. निर्विकारपणे मला परत दिलं.

“तुला हे वाचून खरंच काहीच वेगळं वाटलं नाही?”

“नाही. लिलाताईंचं मराठी भाषेवर प्रभुत्त्व आहे म्हणून त्यांनी चांगल्या भाषेत आपलं सांत्वन केलंय एवढंच. बाकी वेगळं काय आहे त्यात?” ती म्हणाली.

तिचंही बरोबरच होतं. समीरच्या आजारपणाच्या बाबतीतल्या कांही गोष्टी तिला त्रास होऊ नये म्हणून मी त्या त्या वेळी मुद्दामच सांगितल्या नव्हत्या. आता सगळं घडून गेल्यानंतर ते तिला सांगण्यात कशाचाच अडसर नव्हता. ते नाही सांगितलं तर या पत्रातलं मला जाणवलेलं वेगळेपण तिला कसं  जाणवावं….? पण ती ते सगळं समजून घेण्याइतकी सावरलेली नाहीय. सगळं ऐकल्यानंतर ती बिथरली तर? नकोच ते‌. जे सांगायचं ते तिचा मूड पाहून तिच्या कलानेच सांगायला हवं. तरीही ती केव्हा सावरतेय याची वाट पहात आता गप्प राहून चालणार नाही. लवकरात लवकरात लवकर तिला या एकटेपणातून बाहेर काढायलाच हवं….’

कितीतरी वेळ असे उलट सुलट विचार माझ्या मनात गर्दी करत राहिले. तिने चहाचा कप माझ्यापुढे ठेवला आणि मी भानावर आलो. डोळे पुसत ती किचनमधला पसारा आवरु लागली.

“आरती, ऐक माझं. पटकन् जा आणि आवर तुझं. मी तयार होतोय..”

“कां ? कुणी येणार आहे कां?”

“नाही..” मी हसून म्हटलं “कुणीही येणार नाहीय, आपणच जायचंय..”

“आत्ता? कशाला? कुठं जायचंय..?”

मला एकदम लिलाताईच्या माहेरघराची आठवण झाली.ते सर्वजण किर्लोस्करवाडी सोडून कोल्हापूरला आले त्याला दहा वर्षं होत आली होती. सुरुवातीची एक दोन वर्ष कष्टात गेली तरी आता त्यांचं छान बस्तान बसलं होतं.स्वत:चं घर झालं. कोल्हापूरला उद्यमनगरमधे स्वतःचं वर्कशॉप होतं, दोन लेथ होते, मशिनरी स्पेअर पार्टसचं स्वतःचं दुकान होतं. सगळे भाऊ स्वतः राबत होते. दोन वर्षांपूर्वीपासून लिलाताईचे वडिल प्रकृती अस्वास्थ्यामुळे सर्व पसारा मुलांच्या हवाली करून अलिकडे घरी अंथरुणाला खिळून असायचे. क्वचित मधे कधीतरी एक दोनदा कामानिमित्ताने त्या भागात गेल्यानंतर मी उभ्या उभ्या त्यांच्या घरी जाऊन आलो होतो. पण त्यालाही बरेच दिवस गेले होते. शिवाय सगळी हालहवाल लिलाताई वाडीला भेटली की वेळोवेळी तिच्याकडून समजायचीच. माझा लहान भाऊ कोल्हापूरमधेच असल्याने नेहमी त्यांच्या संपर्कात असायचा. त्याच्याकडून चार दिवसांपूर्वीच लिलाताईचे वडील गेल्याचे समजले होते. या रविवारी मी त्यांच्या घरी भेटून यायचे ठरवले होतेच.त्यापेक्षा आरतीलाही बरोबर घेऊन आजच गेलो तर…? हा विचार मनात आला तेव्हाच आरतीने मला पुन्हा विचारले…”सांगा ना, कुठं जायचंय..?”

उद्यमनगरमधे. लिलाताईचे वडील नुकतेच गेलेत. तिच्या आईला भेटून तरी येऊ.” मी म्हणालो.

आरती गप्पच झाली एकदम.

“का गं? काय झालं?”

“नाही… नको.”

“का ?”

“आपला समीर अडीच तीन महिने दवाखान्यात अॅडमिट होता. त्यांच्यापैकी कुणी आलं होतं कां बघायला? तो गेल्याचंही समजलं असेलच ना त्यांना? त्यानंतरही कुणी आलं नाही.आपणच कां जायचं?”

मी निरुत्तर झालो. ती बोलली यात तथ्य होतंच.पण तरीही मला ते स्विकारता येईना.

हे बघ, त्यांनी केलं ते न् तसंच आपणही करायचं कां? लिलाताईचे वडीलही झोपून होते. त्यांचा कांही प्रॉब्लेम असेल. इतर कांही अडचणी असतील. त्यामुळे येणं जमलं नसेल. पण ती अगदी साधी माणसं आहेत गं. माणुसकी सोडून वागणारी तर अजिबातच नाहीयत.आणि आपण रहायला जातोय कां तिकडे? घटकाभर बसून बोलून येऊ. त्यांनाही बर वाटेल.”

ती न बोलता स्वतःचं आवरू लागली. मला तेवढं पुरेसं होतं. ती यायला तयार झालीय

हेच खूप होतं माझ्यासाठी.  

त्यांच्या घराचं दार उघडंच होतं. हॉलमधे दारासमोरच्या भिंतीला टेकून लिलाताईच्या  आई नेहमीसारख्या बसून होत्या.

मला दारात पहाताच त्यांना गलबलून आलं.

“ये रेss माज्या लेकरा..ये…” रडवेल्या आवाजातच त्यांनी अतीव मायेनं आमचं स्वागत केलं.आम्ही आत जाताच आरतीकडं पाहून त्यांचे डोळे भरुन आले.त्यांनी तिला जवळ बोलावलं..

“तू कां उबी? ये माझ्याजवळ.बैस अशी..” म्हणत तिला जवळ बसवून घेतलं.

” खूप आजारी होते कां हो बाबा?”

” हां तर काय? तरण्या वयापासून घाण्याला बांदलेल्या गुरासारका राबराब राबल्येला जीव त्यो. दोन वर्सं झाली आंथरुन सोडलं नव्हतं बग ल्येका. मी ही अशी.लांबून बघत बसायची निस्ती. पण समद्या पोरांनी लै शेवा केली बग त्येंंची.”

बोलता बोलता आरतीकडं लक्ष जाताच त्या बोलायचं थांबल्या.

” हे बघ बै.झालं गेलं गंगेला अर्पण करुन टाकायचं बग.त्यातच रुतून बसायचं न्है.कळतंय का? यील त्ये पदरात घ्यायचं न् पुढं जात -हायचं बग.” त्यांनी तिला समजावलं. त्यांच्या तोंडून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द त्यांच्या अंत:करणातूनच उमटलेला असावा इतका आपुलकीने ओथंबलेला होता.”गप.रडू नको. तुजा इस्वास नाई बसनार,पन इतं गेटभाईर जीप हाय नव्हं , तिची डिलीवरी कवा मिळालीती सांगू?तुजं बाळ देवधर डाकतराकडं अॅडमीट झालंय त्ये आमाला समजलं त्याच दिवशी. मी कोल्हापूरच्या अंबाबाईचं दरसन घ्यून लई वर्सं झाली बग.पोरं म्हनत हुती ‘चल.तुला उचलून नव्या जीपमंदी बशीवतो न् अंबाबाईच्या दरसनाला बी तसंच उचलून घ्यून जातो म्हणून.तवा म्या काय म्हनले ठाव हाय? मी म्हनले, त्या म्हाद्वार   रस्त्यावरच अरविंदाचं बाळ हाय नव्हं दवाखान्यात? अंबाबाईचं दरसन राहूं दे.. मला उचलून त्या दवाखान्यात नेताय का सांगा.तरच मी जीपमध्ये बशीन. त्येच्या बाळाला बगून तरी येते यकडाव. पन दोन अवगड जिनं चढाय लागत्यात म्हनली पोरं.त्ये कसं जमणार हुतं? म्हनून मग जीपमदे बसनं न् देवीचं दरसन दोनी बी नगंच वाटलं. आज तुमी दोगं आला झ्याक वाटलं बगा…

आरती थक्क होऊन ऐकत होती. तिच्या मनातल्या प्रश्नाचं प्रश्न न विचारताच तिला परस्परच उत्तर मिळालं होतं!

“तुझ्या आईला न् तुला बी माजी लिलाबाई भेटती न्हवं वाडीत न्हेमी? ती सांगत असती मला…”

“हो.बऱ्याचदा भेट होते आमची”

” तिची पन लई सेवा झालीय बग दतम्हाराजांची.तुला म्हनून सांगत्ये..,तुझ्या बाबावानी लिलाबाई बोलती त्ये बी खरं व्हाय लागलंय बग.”

त्या सहज बोलायच्या ओघात बोलून गेल्या न् मग लिलाताईबद्दलच कांहीबाही सांगत राहिल्या.तिच्या वाचासिध्दीबद्दलच्या अनुभवांबद्दलच सगळं. त्यातला प्रत्येक शब्द मला निश्चिंत करणारा होता! सगळं ऐकत असताना लिलाताईच्या पत्रातला मजकूर माझ्या नजरेसमोर तरळत राहिला होता! त्यातला शब्द न् शब्द खरा होणाराय हा विश्वास आरतीपर्यंत कसा पोचवायचा हा प्रश्न मात्र त्याक्षणीतरी अनुत्तरीतच राहिला होता..!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ … जुळल्या सगळ्या त्या आठवणी… ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ … जुळल्या सगळ्या त्या आठवणी… ☆ सौ. अमृता देशपांडे 

परवाच आमच्या ऑफिसने निवृत्त स्टाफसाठी स्पेशल पिकनिक ठरवली होती……त्याबद्दल..

एखादा दिवस असाही असेल… याची कधी कल्पनाही केली नव्हती. असा विचार करताना मन मागच्या 25 वर्षे मागे धावलं. खूप खूप आठवणी  ” मी आधी, मी आधी ” करत धावू लागल्या.

आपल्या शिक्षणाचा आणि डिग्रीचा कोट घालून, दर्जेदार पोस्टचा काटेरी मुकुट स्वीकारलेले सर्वेसर्वा ऑफिसर्स.

जबाबदारीची जागा सांभाळताना त्यांची होणारी तारेवरची कसरत त्यांच्या व्यक्तिमत्वातून व्यक्त होत होती. बिनचूकपणा, शिस्त, आणि वक्तशीरपणा यांचा परिपाठ स्वतः कृतीत आणून इतरांना मार्गदर्शन करणारे वरच्या श्रेणीचे ऑफिसर्स ही काॅर्पोरेशनची दर्जेदार संपत्ती होती. तसेच

त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि आदेशाप्रमाणे काम करणारे कर्मचारी ह्या सर्वांचा एकसंध परिवार म्हणजे आपले काॅर्पोरेशन. हा परिवार सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एकत्र एका छताखाली नांदत होता.

लहान लहान कामापासून मोठ्या मोठ्या कामात येणा-या अडचणी एकमेकांच्या सहाय्याने, सल्लामसलतीने सोडवल्याही जात होत्या. काम करताना अनेकदा चुकाही होतच होत्या, पण त्यात सुधारणा करून आपला परफाॅर्मन्स चांगला होण्यासाठी धडपडही होती.

व्यक्तिगत आयुष्यातले चढ-उतार, आनंदाचे-दुःखाचे प्रसंग , एकमेकांना मानसिक आधार देणे, अशी वाटचाल चालू होती.

प्रमोशन मिळालेले खुशीत, तर न मिळालेले नाराज! अशा संमिश्र घटना 3-4 वर्षात घडायच्या.

त्यावेळी  काम करताना ऑफिस फाईल्स हे महत्वाचं आणि एकमेव माध्यम होतं. जेव्हा आपल्या प्रपोजल नोटवर APPROVED असा शेरा मिळून ठसठशीत, वळणदार सही दिसली की खूप मस्त वाटायचं.

कित्येकदा अनेक शासकीय, बिन शासकीय आस्थापनातून, विभागातून ( गोव्यातच नव्हे तर देशभरात ) लेडीज स्टाफवरती होणारे नकोसे अनुभव कानावर यायचे. त्यावेळी आपल्या ऑफिसमध्ये मिळणारी मानसिक, भावनिक आणि शारिरीक सुरक्षितता प्रकर्षाने जाणवायची.

ऑफिसमधले असलेलं वातावरण अतिशय सौजन्यपूर्ण होतं. साधेपणा, शालीनता , आदर, नम्रता ह्या शब्दांना मान होता. तो प्रत्येकाच्या बोलण्यातून     वागण्यातून दिसत होता. माझ्याकडे जर कुणी काही विचारायला आले तर नकळत उभी राहून त्यांचे बोलणे ऐकणे, ही न सांगता होणारी प्रतिक्रिया होती. आवाज मोठा करून बोलणे, मोठमोठ्याने हसणे ह्यावर  स्वतःच घातलेली बंधने होती.

 हा

ऑफिसमधल्या आधीच्या लोकांनी घालून दिलेला संस्कार- ठेवा होता.

वर्षामागून वर्षे गेली. हळूहळू एक एक जण 58-60 वयाला येवून निवृत्तीला पोचले. आणि गेल्या दहा पंधरा वर्षात बघता बघता एक पिढीच निवृत्त झाली.

काल पहिल्यांदाच कितीतरी वर्षांनी सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळाली आणि पूर्वीचे राग-लोभ, रुसवे-फुगवे सर्व विसरून एकमेकांना भेटताना, बोलताना, क्षेमकुशल विचारताना होणारा आनंद प्रत्येकाच्या चेह-यावर ओसंडून वहात होता. जे कुणी हे जग सोडून गेले, त्यांच्या आठवणींनी मन भरून येत होते. कालचा दिवस एक अलौकिक, अकल्पनीय आनंदाने भारलेला होता. . काहीतरी हरवलेलं सापडल्याचा अनुभव होता.

इतक्या वर्षांनी एकत्र भेटून झालेला आनंद एक अनामिक आत्मिक सुखदायी होता. हे मात्र नक्की.

तरूण पिढीच्या शिलेदारांनीही भरभरून , आपुलकीने आणि आतिथ्यपूर्वक सरबराई केली, पाहुणचार केला.

PICNIC EVENT

WELL PLANNED

WELL ORGANISED

WELL MANAGED

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आयुष्याची सरगम… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

आयुष्याची सरगम… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

आयुष्याची सुरावट ”सा रे ग म प ध नी सा’ या सप्तसुरातून साकार होत असते किंवा केली जाते. हे सूर जितके सच्चे, तितके त्यातून निर्माण होणारे गीत सुरेल निघते. सप्तसुरांच्या संगतीने आपले आयुष्य सुंदर सुरमयी बनते कारण यातील प्रत्येक सूर हा त्याच्या विचाराशी किंवा आशयाशी सच्चा राहतो.

*सा.. *आयुष्याचा प्रारंभ हाच ‘सा’ मधून होतो त्यामध्ये जीवनाचे सातत्य समाविष्ट आहे.

 रे… रेंगाळणे.. आयुष्याची वाटचाल चालू असताना आपण अधून मधून थांबतो किंबहुना रेंगाळतो..

ही वाटचाल जेव्हा शांतपणे सुरू असते, तेव्हा ‘रे’ सुराची निर्मिती होते.

ग.. विचारांना ‘ग’गती देतो. तर कधी

‘ग’ हा गमावल्याची भावनाही निर्माण करतो.

म… मानून घेणे, हे ‘म’ चे वैशिष्ट्य आहे.. जे आहे त्यात समाधान मानून आपल्या आयुष्याची वाटचाल आपण सुखद करतो.

प.. मनाची व्याप्ती वाढवणे किंवा पसरवणे हे ‘प’ चे वैशिष्ट्य! सप्तसुरांतील ‘प’हा चढती कमान दाखवतो. !

ध.. ‘ध’धारण करणे.. मनाची शांतता धारण करणे हे शिकवणारा

हा ‘ध’ आहे. ‘ध-‘ धारयती हा पुढे

‘नि’ मध्ये जातो.

नि – निवृत्ती कडे वाटचाल..

जगण्यातून निवृत्ती घेता येणे हे बोलणे सोपे पण आचरण्यास अवघड असे तत्व!ही निवृत्ती ज्याला साधली त्याला ‘सा’ची सायुज्यता साधणे कठीण जात नाही..

सायुज्यता – मोक्षाच्या चार अवस्थांपैकी चौथी सायुज्यता!

ही साधली तर वरच्या ‘सा’च्याजवळ आपण पोचू शकतो असे म्हणायला हरकत नाही..

आयुष्याच्या सरगमातील हे ‘सारेगमपधनीसा’ चे सूर विचार केला तर किती वेगळे अस्तित्व दाखवतात ना?

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ओळख…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “ओळख…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

ओळख असणं आणि ओळखत असणं यातलं अंतर म्हणजे एक प्रवास आहे. हा एकमेकांनी सोबत करावा लागतो. या प्रवासात येणारे अनुभव, यात आपसात झालेली अनेक गोष्टींची देवाणघेवाण, वागणं, चालणं, बोलणं, विचार, आवडनिवड, व्यवहार यावरून आपण केलेले तर्क, आणि त्यावरुन घेतलेला निर्णय, या सगळ्या गोष्टींवरून ओळख असणं इथून सुरू झालेला प्रवास ओळखत असणं इथे थांबतो.

ओळख हि सुरुवात आहे. तर ओळखण याचे बरेच टप्पे आहेत. लहान मुलांना सुध्दा सुरुवातीला ओळख लागते. आणि ओळख झाली की मग ते ओळखायला लागतात.

ओळख निर्माण व्हायला काही कारण असावं लागतं. सुरुवातीला छोट्या छोट्या गोष्टींनी ओळख होते. आणि ओळखत असण्यात याच छोट्या छोट्या गोष्टींचा काही प्रमाणात, काही बाबतीत विस्तार असतो.

ओळख करावी का? दाखवावी का? असा संभ्रम ओळखीच्या सुरुवातीला असू शकतो. पण ओळखत असल्यावर बऱ्याच गोष्टीत आपलं स्पष्ट मत आणि ठाम निर्णय सांगू शकतो.

ओळख असणं आणि ओळखत असणं हा एक अभ्यास आहे. या अभ्यासाची सुरुवात सुध्दा इतर विषयासारखी तोंडओळख झाल्यावर सुरू होते. काही भाग समजायला सोपे आणि सहज वाटतात. तर काही भाग समजून घ्यावे लागतात. तर काही लक्षात सुद्धा येत नाहीत.

एखाद पुस्तक नुसतं चाळणं, आणि ते व्यवस्थित वाचणं यात जेवढा फरक आहे, तेवढाच ओळख असणं आणि ओळखत असणं यात आहे.

एखादा श्लोक किंवा स्तोत्र पाठ असणं म्हणजे ओळख असणं, तर त्याच्या शब्दाच्या अर्थासह तो, का? केव्हा? कसा म्हणावा…. हे माहिती असणं म्हणजे ओळखत असणं.

जवळपास सगळ्याच कार्यक्रमात प्रमुख पाहूण्यांची ओळख करून दिली जाते. बरेच जण त्यांना ओळखत असतात, तरीही ओळख करून देतांना काही विशेष गोष्टींवर भर दिला जातो. ज्यामुळे त्यांची ओळख नव्याने होईल असा प्रयत्न असतो.

एखादी गोष्ट, व्यक्ती, संस्था, वस्तू या सगळ्यांच्या बाबतीत ओळख असणं ते ओळखत असणं असा संबंध असतो. आणि ओळख जशी वाढत जाईल, तसं काही बारकावे समजतात आणि मग आपण ओळखायला लागतो.

ओळख असण कदाचित एकांगी असेल, पण ओळखण हे एकांगी नसतं, नसावं. ओळखण्यात अनेक गोष्टी, पैलू, आवड, सवयी, आणि मुख्य म्हणजे व्यवहार माहिती असतात किंवा माहिती असावे लागतात.

ओळख असणं याच रुपांतर ओळखत असण्यात होतं तेव्हा एकमेकांबद्दल एक प्रकारचा विश्वास निर्माण झालेला असतो. आणि या विश्वासावरच ते ओळखत असणं किती काळ टिकेल हे ठरतं.

ओळख असण्यात सुखदुःखाची विचारणा असते. पण त्याच सुखदुःखाची जाणीव मात्र ओळखत असण्यात असते.

जेवणाच्या पानात अनेक पदार्थ असले तरी त्यांचं आपलं आपलं एक वैशिष्ट्य असतं, आणि ते किती असावेत याच सुध्दा एक प्रमाण असतं. तसंच स्वभावात सुध्दा अनेक गोष्टी, वैशिष्ट्य असतात आणि स्वभावातली हि वैशिष्ट्य कोणती, आणि किती आहेत हे ओळखता आली तरच आपण म्हणतो, मी ओळखतो……….

अगोदर ओळख असणं आणि ओळखत असणं या दोघांमध्ये प्रत्यक्ष संबंध असायचा. पण आधुनिक काळात आणि वेगवेगळ्या साधनांमुळे बऱ्याच जणांशी आपली ओळख असते. पण आपण एकमेकांना ओळखत मात्र नसतो. त्यामुळे एकमेकांचा सहवास नसला, काही चांगले वाइट अनुभव आले नाही तरीही ओळख असू शकते. पण ओळखत असायला सहवास आणि अनुभव गरजेचे असतात.

कदाचित याच कारणामुळे ओळख असणं ही संकल्पना विस्तारित आणि संकुचित दोन्ही अर्थांनी असते. फेसबुक, व्हाॅटस्ॲप, इन्स्टाग्राम, ट्विटर यामुळे आपण प्रत्यक्ष न पाहिलेल्या आणि बऱ्याच लांबच्या लोकांनाही ओळखतो.

पण चार घरं सोडून पलिकडे कोण राहत यांना मात्र आपण ओळखत नाही. या ओळखण्यात, कोण? वयस्कर व्यक्ती आहेत का? त्यांना कशाची गरज, मदत लागते का? अशा खूप गोष्टींचा संबंध आहे…..

एखादी गोष्ट नुसती बघणं, आणि खरेदी करण्यासाठी बघणं यात जितका फरक असतो तितकाच ओळख असणं आणि ओळखत असणं यात असू शकतो.

ओळख असण्याच ओळखत असण्याच्या प्रवासात काही टप्पे, पायऱ्या असतात. या व्यक्ती, स्वभाव, आवडनिवड, जमवून घेण्याची पद्धत, विश्वास, त्याग यावर अवलंबून असतात. आणि गरजेनुसार त्या कमीजास्त असू शकतात.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रामाची निर्मल सीता व लक्ष्मी! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

😅 रामाची निर्मल सीता व लक्ष्मी! 😅 श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“काय पंत आज तुमच्या घरातून t v चा आवाज नाही आला सकाळ पासून नेहमी सारखा.”

“अरे वैताग आणला आहे नुसता या tv वाल्यांनी!”

“काय केबल गेली की काय तुमची?”

“अरे केबलला काय धाड भरल्ये?  व्यवस्थित चालू आहेत सगळे चॅनेल्स.”

“मग तुमचा सखा सोबती आज मुका कसा?”

“अरे काय सांगू तुला, कुठलेही चॅनेल लावा सगळीकडे बजेट, बजेट आणि फक्त बजेट!  दुसरा विषयच नाही या लेकांना. नुसता उच्छाद आणलाय सगळ्या चॅनेलवाल्यांनी.”

“पंत, बजेट हाच सध्याचा गरम विषय आहे आणि त्यावर हे चॅनेलवाले आपली पोळी भाजून घेत असतील तर त्यात नवल ते काय?”

“तू म्हणतोस ते बरोबर आहे रे मोरू,  पण ज्यांना “अर्थसंकल्प” हा  शब्द सुद्धा नीट उच्चारता देखील येत नाही, असे लोक वायफळ चर्चा करून आपल्याला अर्थकारण समजावणार? “

“पंत, सध्या दिवसच तसे आलेत, त्याला आपण तरी काय करणार?”

“काय करणार म्हणजे, सरकारचा रिमोट जरी दिल्लीवरून चालत असला, तरी आपल्या t v चा रिमोट आपल्या हातातच असतो ना? मग ती वायफळ चर्चा ऐकण्यापेक्षा केला t. v. बंद!”

“पण पंत त्यात तुमचेच नुकसान नाही का?”

“त्यात कसले बुवा माझे नुकसान? उलट आता बजेटच्या आधीच विजेचे दर वाढलेत, मग t v बंद करून मी एक प्रकारे पैशाची बचतच नाही का करतोय?”

“पण पंत सरकारने कर सवलत किती दिली?  काय काय स्वस्त होणार? काय महाग होणार हे तुम्हाला कसे कळेल?”

“कसं म्हणजे, पेपर मधून, जो मी रोज सकाळी वाचायच्या आधी तूच लंपास करून वाचतोस!”

“काय पंत मी…. “

“अरे मस्करी केली मी तुझी. बर ते सगळे सोड, पण तुला माहीत आहे का, बजेट हा शब्द कुठून आला ते?”

“नाही खरच माहीत नाही पंत, मला कळायला लागल्या पासून अर्थसंकल्पाला इंग्रजी मधे बजेट म्हणतात एव्हढेच ठाऊक आहे!”

“तुला सांगतो ‘बजेट’ या शब्दाची निर्मिती फ्रेंच शब्द ‘बुजेत’ शब्दा पासून झाली. या शब्दाचा अर्थ ‘चामड्याची पिशवी’ असा होतो. फ्रेंच मंडळी पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी चामड्याच्या पिशवीचा पूर्वी वापर करीत असत आणि या पिशवीला ते तेंव्हा ‘बुजेत’ असे म्हणत. पण अर्थशंकल्पला बजेट हा शब्द प्रचलित होण्या मागे एक गमतीदार किस्सा आहे बघ मोरू!”

“कोणता किस्सा पंत?”

 “अरे १७३३ साली इंग्लंडचे माजी अर्थमंत्री सर रॉबर्ट वॉलपोल वार्षिक अर्थसंकल्प सादर करण्यासाठी त्यांच्या संसदेत आले होते. येताना त्यांनी स्वत:सोबत एक चामड्याची पिशवी देखील आणली होती. याच पिशवीत त्यांनी अर्थसंकल्पाचे कागदपत्र ठेवले होते. ती पिशवी उघडतांना  त्यांनी ‘बुजेत इज ओपन’ असे म्हटले. परंतु ‘बुजेत’ हा शब्द त्यांनी अशा प्रकारे उच्चारला की सभागृहातील इतर मंडळींना तो ‘बजेट’ असा ऐकू आला. मग काय, तेव्हापासून जगभरात बजेट हाच शब्द प्रचलित झाला.”

“पंत, फारच मनोरंजक आहे हा बजेट शब्दाचा इतिहास. बजेट शब्दा बद्दल तुम्हाला इतकी माहिती आहे, पण खऱ्या बजेट मध्ये तुम्हाला खरच इंटरेस्ट नाही याचेच जरा नवल….. “

“अरे इंटरेस्ट असला काय आणि नसला काय, रोजच्या खर्चाची तोंडमिळवणी करणे भाग आहे ना? आणि मला असे एक तरी उदाहरण सांग ना, की अमुक एका बजेट नंतर अमुक तमुक गोष्टींच्या किमती खाली आल्या म्हणून?”

“तसच काही नाही, काही काही गोष्टी खरच स्वस्त…… “

“होतात, होतात पण तात्पुरत्या, परत ये रे माझ्या मागल्या. नंतर तुझ्या माझ्या सारख्या सामान्य माणसाला त्याची सवय होवून जाते!  You know,  public memory is very short.”

“हो, पण पंत आपल्या बजेटची साऱ्या जगात चर्चा होते आणि……”

“त्याचा जागतिक अर्थकारणावर परिणाम होतो वगैरे, वगैरे, असेच ना? अरे मोरू म्हणून बजेट वाचतांना कविता वाचून आणि कथा सांगून कितीही साखरपेरणी केली, तरी प्रत्यक्ष महागाईचा सामना करतांना सामान्य माणसाचे  तोंड कडवट होतेच, त्याचे काय? “

“तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे पण…… “

“पण बिण सगळे सोड, मला एक सांग, आपण कितीही संकल्प केले तरी आपल्या खिशातल्या अर्थाला ते झेपायला नकोत का? अरे आपल्या घरचे महिन्याचे बजेट  सांभाळतांना घरच्या फायनान्स मिनिस्टरची काय हालत होते हे तुला मी वेगळे सांगायची गरज आहे का?”

“हो बरोबर, या बाबतीत सगळ्याच आपल्या घरातल्या फायनान्स कम होम मिनिस्टरनां माझा सलाम! महागाईचा कितीही भडका उडाला तरी घरातले बजेट सांभाळणे त्याच  जाणोत! पंत पटल बुवा तुमच म्हणण.”

“पटल ना, मग आता आमचा तू नेलेला आजचा पेपर आणून दे बरं मुकाट, कारण t v बंद केल्याने तोच आता माझा सखा सोबती!”

“तरी पण तुमच्या सारख्या सिनियर सिटीझनने “बुजेत” मध्ये इंटरेस्ट न दाखवणे मला काही पटत नाही.”

“अरे त्यात न पटण्या सारखं काय आहे. सगळ्या बजेट मधे तेच तेच तर असत. एका हाताने दिल्या सारखे करायचे आणि दुसऱ्या दहा मार्गानी दोन हातांनी काढून घ्यायच! आता तो आकडयांचा खेळ खरंच नकोसा वाटायला लागलाय रे! अरे पूर्वी लाखावर किती शून्य सांगताना दमछाक व्हायची आणि बजेटचे सगळे आकडे लाख करोड मधे!  मग माझ्यासारख्या पामराचे काय होईल याची तू कल्पनाच केलेली बरी.”

“पंत, तरी पण माझा मुख्य प्रश्न उरतोच ना!”

“तू तसा ऐकण्यातला नाहीस माहित आहे मला. मोरू आता तुला शेवटचे एकच सांगतो, निर्मल मनाच्या कुठल्याही रामाच्या सीतेने जरी अर्थसंकल्प मांडला, तरी त्याला त्या त्या वेळचे विरोधक नांवच ठेवणार आणि त्या त्या वेळचे राज्यकर्ते मांडलेल्या बजेटची प्रशंसाच करणार, हा आजपर्यंतचा इतिहास आणि अलिखित नियमच आहे! त्यामुळे बजेट चांगले का वाईट या फ़ंदात न पडता, घरातले “बुजेत” सांभाळणाऱ्या घरच्या लक्ष्मीला माझे शतशः प्रणाम!”

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares