मराठी साहित्य – विविधा ☆ एक सोंगटी गेली तरी…. ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

?  विविधा ?

☆ एक सोंगटी गेली तरी…. ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे 

अलीकडे एक पोस्ट वाचली. एकट्या राहणाऱ्या चिनी आजी बाईंनी नर्सिंग होम मध्ये कायम राहायला जाण्यापूर्वी लिहिलेली. तिने आता आपल्या आयुष्याच्या कटू सत्याचा स्वीकार केला आहे. आपली मुले त्यांच्या आयुष्यात गर्क आहेत आणि त्यांच्यावर त्यांची मुलं मोठी करण्याची जबाबदारी असल्यामुळे आपल्या आईची काळजी घ्यायला ते असमर्थ आहेत हे पटल्यावर तिने आपले उरलेले आयुष्य जगण्यासाठी सर्व सोयींनी युक्त अशा नर्सिंग होम मध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. तिथं जाऊन राहणं महाग आहे म्हणून तिला स्वतःचे राहते घर विकावे लागणार आहे आणि ते तिच्या मुलांना मान्य आहे.

नर्सिंग होम मध्ये तिच्यासाठी एक छोटी खोली असणार आहे त्यात पलंग, एक छोटे कपाट टेबल फ्रिज मायक्रोवेव्ह, वॉशिंग मशीन वस्तू असणार आहेत.

तिच्या आयुष्यभराचा संसार कपडे, हौसेने घेतलेले फर्निचर, स्वयंपाकाची भांडी, आवडीच्या वस्तू, घेतलेली पुस्तके यामधून फक्त कपाटात मावेल एवढेच ती बरोबर नेऊ शकणार आहे उरलेल्या सामानाचे काय करायचे हा तिच्यापुढे प्रश्न आहे.

तिच्याकडे या सर्व वस्तू विकून टाकण्यासाठी वेळ आहे ना शक्ती आहे… महागड्या वस्तू द्यायचा तर कोणाला देणार? तिच्या मुलांना, नातेवाईकांना कोणाला त्यातले काहीच नको आहे.

नर्सिंग होम मध्ये जाताना फक्त जरूरीपुरते कपडे भांडी स्वत:च्या महत्वाच्या वस्तू म्हणजे ओळख पत्र, हेल्थ इन्शुरन्स कार्ड, बँकेचे कार्ड, जेष्ठ नागरिक कार्ड एवढेच नेणे गरजेचे आहे. आता तिला जाणवते की आयुष्यभर खूप प्रसिद्धी, मानपान, यश, बंगले, बक्षिसे मिळवली पण आयुष्याच्या शेवटच्या दिवसासाठी तुम्हाला राहायला एक खोली आणि झोपायला बिछाना एवढेच लागते.आणि  जगातून जाताना अक्षरश: रिकाम्या हाताने जावे लागणार आहे. ही पोस्ट वाचली आणि क्षणभर काहीच सुचेना, घशाशी आवंढा दाटून आला. सगळ्या गोष्टी बद्दल अनासक्ती वाटू लागली. सगळं फोल वाटू लागले. पन्नास वर्षे गोळा केलेला संसार डोळ्या पुढे आला. गेल्या पन्नास वर्षात खूप सामान गोळा झाले आहे. मुली लग्न होऊन गेल्या, त्या त्यांच्या वस्तू, कपडे घेऊन गेल्या तरी घरातली कपाटे भरलेली होती.

आता मी एकटी उरले आहे मागे. ना दुकानात जाण्याची इच्छा ना नवीन खरेदीची आवड तरीपण कपाट रिकामी पडलेली नाहीत.

ही पोस्ट वाचली तेव्हा घरातला पसारा डोळ्यापुढे आला. माझ्या मुली आपल्या देशात असत्या तर प्रश्न नव्हता. दहा फेऱ्या मारून त्यांनी घर आवरले असतं पण दोघी परदेशात. मी गेल्यावर एकदा येतील, नंतर त्या येणार कोणासाठी? आल्या एखाद्या खेपेस तर  काय काय करतील? सगळं भंगारवाल्याला देऊन टाकतील कदाचित. पणआईची आठवण म्हणून काय घेऊन जातील,.? मला एकदम सासुबाई गेल्या तेव्हाची आठवण झाली. खूपवर्ष झाली त्यांना जाऊन. त्या गेल्या तेव्हा मी त्यांचा चष्मा आठवण म्हणून घेतला होता व तो आता कुठे गेला आठवत नाही. अगदी आई अण्णांच्या कितीतरी वस्तू मी जपल्या आहेत..? अण्णांचीएक वही ठेवली होती जपून. पण ती सुद्धा हवी तेव्हा सापडणार नाही बहुतेक.

मग माझ्या मुली काय नाही तर आईची आठवण म्हणून फारतर एखादी साडी घेऊन जातील बरोबर आणि ती कपड्यांच्या ढिगात तळाशी जपून ठेवतील. आठवण होईल तेव्हा बाहेर काढतील, तीच्या वरून हात फिरवतील आणि बघता बघता आपल्या संसारात गुंतून जातील.आई वडिलांची आठवण येणार नाही असं नाही पण आठवण मनातल्या मनात असेल. हळू हळू साडी घडीतच जीर्ण होऊन जाईल.

पाणी नेहमी पुढे पुढेच वहात जाते ना..? वाहताना खूप गोष्टी, आयुष्याच्या वळणावळणाच्या प्रवाहात कुठल्यातरी तीरावर मागे सुटून जातात आणि शेवटी काही आंबटगोड चवी शिल्लक राहतात.

आपल्याला कदाचित आपले शेवटचे दिवस वृद्धाश्रमात किंवा नर्सिंग होम मध्ये नाही घालवावे लागणार पण आपल्याला शेवटच्या प्रवासाला जाताना सर्व धनदौलत, घरदार, जपलेल्या वस्तू, नातीगोती, राग रुसवा, माया ,मोह सर्व इथेच सोडून जायचं आहे. आपली मुलं नातवंड प्रियजन त्यांच्यात अडकलेला जीव हे शरीर सोडून बाहेर पडेल तेव्हा आपण सर्वापासून दूर वेगळ्या जगात जाणार आहोत आणि थोड्या काळानंतर सर्व जण आपल्याला विसरून जीवनात नव्याने रमुन जाणार आहेत. “जन पळभर म्हणतील हाय हाय”हा जगाचा नियमच आहे.

या खेळातले खेळाडू बाद झाले की कायमसाठी आपल्या आयुष्यातून, आठवणीतून नाहीसे होतात हे त्रिकालाबाधित सत्य प्रत्येकाने समजून घ्यायला पाहिजे. एक गोष्ट स्वतःला बजावत राहायच आहे

ठाउक आहे मला

न काही मज वाचुनि अडणार

एक सोंगटी बाजूस सारून

खेळ पुन्हा सरणार…!!!

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आज किती दिवसांनी … ☆ श्री शरद दिवेकर

श्री शरद दिवेकर

?  विविधा ?

☆ आज किती दिवसांनी… ☆ श्री शरद दिवेकर ☆

आज किती दिवसांनी आलास तू घरी ! सकाळी तुझी चाहुल लागली मला. खरं तर रोज तुझी चाहुल लागली की मी लगेचच दार उघडतो. पण आज अंमळ उशीराच उघडलं दार.

दार उघडून तुला घरात घेतलं, थोडंसं न्याहाळल्यासारखं केलं आणि लगेच दुसर्‍या कामाला निघून गेलो. तुला वाईट वाटलं असेल थोडं. कारण मी रोज असं करत नाही. तुला घरात घेतलं की तुझा चेहरा तरी नीट बघतोच, तुझ्या अंतरंगात देखील डोकावतो बहुधा.

जवळ जवळ रोजच येतोस तू. क्वचित कधीतरी येत नाहीस. त्या दिवशी देखील असं वाटतं की तू आला असशील. पण दार उघडावं तर तू नसतोसच बाहेर. मग हिरमोड होतो मनाचा. मग मनाला समजवावं लागतं.

गेले काही दिवस तुझी आठवणही फारशी येत नव्हती. कारण सवय झाली होती तू नसण्याची. विचार करतच होतो की तुला घरात घ्यायचं की नाही याचा, की घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद करायचे ! पण नक्की काही ठरत नव्हतं. अन आज अचानक उगवलास धूमकेतूसारखा.

द्विधा मनःस्थिती होण्याचं कारणही तसंच आहे. पन्नास पंचावन्न वर्षांचा ऋणानुबंध आहे आपला. तुझं व्यक्तीमत्वही याला कारणीभूत आहेच. तुझी माझी सर्वच मतं काही पटत नाहीत. खरं तर एकांगी किंवा एकपक्षी मतं असतात तुझी. तरीही तुझ्याऐवजी दुस-या कोणाचा विचार मनात नाही आला एवढ्या वर्षांत.

आता आज पुन्हा आला आहेस घरी. तर येत जा रोज.

रोज माझ्या घरी येणारा महाराष्ट्र टाइम्स

©  श्री शरद दिवेकर

कल्याण

मो 70457 30570, ईमेल – [email protected]

 

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खुली कवाडं..! ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ खुली कवाडं..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

स्री-शिक्षण आणि स्त्री-स्वातंत्र्य याबाबतीत पराकोटीचं प्रतिकूल, उदासिन वातावरण असणारा दिडशे वर्षांपूर्वीचा काळ.वयाच्या नवव्या वर्षी तत्कालीन प्रथेनुसार बालविवाह झालेली एक मुलगी जाण येईपर्यंत असलेल्या माहेरच्या वास्तव्यात आवडीने अभ्यास करू लागते. तिची अभ्यासाची ओढ आणि गोडी लक्षात घेऊन पुरोगामी विचारांचे तिचे सावत्र वडील तिच्या शिक्षणाला प्रोत्साहनही देतात. पुढे ती जाणत्या वयाची होताच रितीनुसार तिची सासरी पाठवणी होते.तिथलं जुनाट वातावरण, कांहीही कामधंदा न करता बसून खाणारा नवरा हे सगळं शिक्षणामुळे प्रगल्भ होऊ लागलेल्या तिच्या मनाला पटणं शक्यच नसतं.ती पहिल्या माहेरपणाला येते ते सासरी कधीच परत जायचं नाही हे मनोमन ठरवूनच.सासरहून नांदायला यायचे तगादे सुरु होतात तेव्हा ‘ न कळत्या वयात झालेलं हे लग्न मला मान्य नाहीs’ असं ती ठणकावून सांगते.

हा वाद तत्कालीन इंग्रज राजवटीच्या कोर्टात जातो.सासरी नांदायला जाणे किंवा सहा महिन्यांचा तुरुंगवास या दोन पर्यायांपैकी एक पर्याय स्विकारायची वेळ येते तेव्हा ‘नको असलेल्या सासरच्या बंदिवासापेक्षा मी तुरुंगवास पत्करेन पण सासरी जाणार नाही ‘असं ती ठामपणे सांगते.

या घटनेनंतरच्या तिच्या संपूर्ण आयुष्याला मिळालेली सकारात्मक कलाटणी आणि पुढे तिने गाजवलेलं अफाट कर्तृत्त्व हा आवर्जून जाणून घ्यावा असा एक प्रदीर्घ अध्याय आहे!

ही गोष्ट आहे दिडशे वर्षांपूर्वी जगभर गाजलेल्या ‘रखमाबाई केस’ म्हणून ओळखल्या गेलेल्या खटल्याची ! रखमाबाई राऊत या खंबीर स्त्रीची ! भारतातली प्रॅक्टिस करणारी पहिली स्त्री डाॅक्टर- रखमाबाई राऊत यांची..!

रखमाबाईंचे सावत्र वडील बुरसटलेल्या विचारांचे आणि म्हणून स्त्री-शिक्षणाच्या बाबतीत अनुदार असते,तर शिक्षणाच्या गोडीची चवही चाखायला न मिळता रखमाबाईंचं उभं आयुष्य तत्कालीन अन्यायग्रस्त स्त्रियांसारखं जळून राख झालं असतं. पण सावत्रमुलीच्या आयुष्यात पसरु पहाणारा मिट्ट काळोख आपल्या चैतन्यदायी विचारांच्या उत्साहवर्धक स्पर्शाने नाहीसा करुन तिच्या आत्मसन्मानाची ज्योत तेवत ठेवणारे तिचे सावत्र वडील , श्री.सखाराम राऊत  रखमाबाईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि तिच्या कर्तृत्वाला आपल्या चैतन्य स्पर्शाने सतत झळाळीही देत राहिले हे महत्त्वाचं आहेच.आणि रखमाबाईंनी  सकारात्मक विचार आणि चैतन्यदायी प्रकाशकिरण आत येण्यासाठी स्वतःच्या मनाची कवाडंही खुली ठेवलेली होती हेही तितकंच लक्षणीय आहे.

 

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! उर्वशी आणि सज्जन ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? उर्वशी आणि सज्जन ! ? 

“न..म..स्का..र 

पं..त,

हा….

तु..म..चा

पे…प….र !”

“अरे मोऱ्या, एवढी थंडी वाजत्ये तर पेपर न्यायचाच कशाला म्हणतो मी ?”

“त्याच काय आहे ना पंत, तुमचा पेपर वाचल्या शिवाय दिवसाची सुरवातच झाल्या सारखी वाटत नाही बघा मला !”

“म्हणजे रे काय मोऱ्या ? माझ्या पेपरला काय जगा वेगळ्या बातम्या असतात की काय ? मुंबईला ‘अभूतपूर्व थंडी’ ही बातमी माझ्या पेपरात काय, ‘मुंबईत उष्णतेची लाट’ अशी थोडीच छापणार आहेत ?”

“तसं नाही पंत, पण चहा पिता पिता तुमचा पेपर वाचला, की लगेच हेड ऑफिसचा कॉल येतो आणि एकदा का तो कॉल व्यवस्थित पार पडला, की सारा दिवस कसा उत्साहात जातो माझा !”

“अरे गाढवा, पण ज्या दिवशी पेपरला सुट्टी असते तेव्हा काय करतोस रे ?”

“जाऊ दे पंत, त्या विषयी नंतर बोलू ! पण मला एक सांगा, तुम्हांला कशी नाही थंडी वाजत या वयात ?”

“या वयात म्हणजे ? गधड्या आत्ता कुठे माझी सत्तरी आल्ये !”

“हॊ, माहित आहे मला, पण या वयात अंगातलं रक्त कमी होतं आणि त्यामुळे थंडी जास्त वाजते असं म्हणतात, म्हणून म्हटलं !”

“अरे आमची जुनी हाडं पेर ! असल्या बारा अंशाच्या थंडीला ती थोडीच भीक घालणार आहेत !”

“पंत, पण थंडी वाजू नये म्हणून तुम्ही काहीतरी उपाय करतच असणार ना ?”

“हॊ करतो नां! अरे मस्त आल्याचा चहा घेतो दोन तीन वेळेला आणि पाती चहाचा काढा सुंठ, काळी मिरी घालून उकळत ठेवला आहे बायकोने, तो पण घेतो मधून मधून ! मग थंडीची काय बिशाद !”

“अच्छा ! पण पंत तुम्हाला एक सांगू का, आपल्या मायबाप सरकारला यंदा आलेल्या बोचऱ्या थंडीची चाहूल आधीच लागली होती, असं मला आता वाटायला लागलंय !”

“असं कशावरून म्हणतोयस तू मोऱ्या ?”

“अहो पंत असं काय करता, सध्या सगळ्या पेपर मधे एकच विषय तर घटा घटा प्यायला, सॉरी, चघळा जातोय ना, वाईन, वाईन आणि फक्त वाईन !”

“तू म्हणतोयस ते बरोबर आहे रे मोऱ्या. अरे त्या वाईनच्या बातम्यांनी किराणामालाच्या दुकान मालकांचे गल्लेपण गरमा गरम झाले असतील नाही !”

“बरोब्बर पंत !”

“मोऱ्या, पण मला एक सांग, आपल्या चाळीच्या कोपऱ्यावरच्या ‘उर्वशी साडी सेंटर’ मधे सकाळ पासून खरेदीसाठी लाईन कशी काय लागलेली असते हल्ली ? काल परवा पर्यंत त्या दुकानात काळं कुत्र सुद्धा फिरकत नव्हतं रे !”

“अहो पंत तो पण वाईनचाच महिमा !”

“काय सांगतोयस काय मोऱ्या ?”

“अहो पंत, त्या उर्वशी साडी सेंटरच्या मालकाने एक स्कीम चालू केली आहे !”

“कसली स्कीम ?”

“अहो पहिल्या शंभर गिऱ्हाईकांना एका साडीवर एक वाईनची बाटली फुकट ! म्हणून तर सकाळ पासून गर्दी असते तिथे !”

“अरे पण नवीन सरकारी नियमांप्रमाणे साडीच्या दुकानात वाईन विकायला परमिशनच नाही, मग तो …..”

“अहो तो वाईन विकतच नाही, तो साडयाच विकतो ! पण एका साडी खरेदीवर तो एक कुपन देतो ! ते घेवून त्याच्याच भावाच्या किराणा मालाच्या दुकानात जायचं आणि ते कुपन दाखवून वाईनची एक बाटली मोफत मिळते ती घेवून घरी जायचं !”

“हे बरं आहे, म्हणजे साडी खरेदीमुळे बायको खूष आणि वाईन मिळाल्यामुळे नवरा पण खूष !”

“अगदी बरोब्बर बोललात पंत ! पंत,

पण एक विचारू का तुम्हांला ?”

“अरे विचार नां, त्याच्यासाठी परमिशन कसली मगतोयस, बोल ! “

“पंत ह्या ब्यागा कसल्या भरल्येत तुम्ही, कुठे बाहेर जाताय का काकूंच्या बरोबर ?”

“मोऱ्या, अरे पुण्यात जाऊन येतोय दोन तीन दिवस हिच्या भावाकडे !”

“काही खास प्रोग्राम ?”

“काही खास प्रोग्राम वगैरे नाही रे ! तुला तर माहित आहेच, हिचा भाऊ पुण्यात ‘अस्सल पुणेरी अर्कशाळा’ चालवतो ते !”

“हॊ मागे काकूंनी सुनीताला ओव्याच्या अर्काची बाटली दिली होती एकदा !”

“हां, तर त्याच हिच्या भावाने त्याच्या अर्कशाळेत, अथक परिश्रमातून साबुदाण्यापासून बनवलेली, उपासाला चालणारी, ‘सज्जन वाईन’ बनवल्ये आणि त्या वाईनच्या पहिल्या बाटलीच बूच, मी माझ्या हस्ते उघडून त्याच्या या नवीन वाईनच मी उदघाट्न करावं असं माझ्या मेव्हण्याला वाटत, म्हणून चाललोय पुण्याला !”

“धन्य आहे तुमची आणि तुमच्या त्या सज्जन मेव्हण्याची !”

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

ताजा कलम  – या पुढे भविष्यात प्रौढ शिक्षणाच्या मास्तरांनी, ‘झोप’ या विषयाला धरून निबंध लिहायला सांगितला, तरी त्या विषयी आज जागेपणी, काहीही न लिहिण्याचा मी संकल्प करत आहे !

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ करोनाचे धडे…☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ  ज्योती विलास जोशी

?  विविधा ?

☆ करोनाचे धडे… ☆ सौ ज्योती विलास जोशी 

थांब……

तुला शिकवीन चांगलाच धडा…

तुझ्या पापाचा भरलाय घडा….

असं म्हणत कोणीसं आलं… ती नक्कीच फुलराणी नव्हती… पुरुषाच्या आवाजातला राक्षस होता तो! ‘करोना’ नाव त्याच!! ‘ती फुलराणी’ नाटकातील मंजुळेचं फर्मास स्वगत ऐकलेले आम्ही लोक.. या करोनाच्या भयावह स्वगतानं हादरून गेलो. फुलराणी स्वर आणि व्यंजन यांच्या ब्रह्मघोटाळ्यात सापडलेली होती, तर करोनानं आम्हालाच ब्रह्म संकटात टाकलं……

‘ये करो ना’ ‘वो करो ना’ असे धडे देत या अतिसूक्ष्म विषाणूनं आम्हाला हैराण करून टाकलं. फुलराणीनं अशोक मास्तरच्या नावानं जितकी बोटं मोडली नसतील तेवढी आम्ही याच्या नावाने रोज मोडतोय हल्ली… अगदी फसवा आणि मायावी राक्षस आहे हा! आपले अणुकुचीदार दात विचकत आला आणि काही न बाइंच बोलत सुटला….

माणसा रे माणसा तू असा रे कसा?

भोग कर्माची फळं रडत ढसाढसा.

आमचं काय चुकलं म्हणून शाप देतोय हा आम्हाला? हो, आणि हा कोण आमच्याविषयी अभद्र बोलणारा? आमच्या प्रश्नार्थक मुद्रेकडं बघून लगेच म्हणाला, ‘पेराल तसे उगवेल’ आमच्या सगळं डोक्यावरून गेलं. आता त्यांनं आमचा माजच काढला.

माज तुझा उत्तरला तरी अजून तोरा

भिकेला लागशील सुधार जरा पोरा.

एव्हाना आमचा माज उतरला होता.आम्ही त्याला साक्षात दंडवत घातला. गयावया करून हात जोडले. क्षमा मागून, आमचे काय चुकले? असा प्रश्न विचारला. आम्ही शरणागत झालेलं पाहून विजयी मुद्रेनं तो आता गझल गाऊ लागला.

युही बेसबब न फिरा करो

कोई शाम घर मे भी रहा करो

कोई साथ भी न मिलेगा जो गले लगोगे

ये नये मिजाज का शहर है

जरा फासले से मिला करो.

आमच्या घराघरात नांदणारा मना-मनाला दुखवणारा नाती संपुष्टात आणणारा हा राक्षस आणि त्याचा डाव आम्ही ओळखला. तो आम्हाला आमच्या आप्तस्वकीयांना भेटायचं नाही असा कायदा करतोय याचा आम्हाला राग आला त्याचा हा कायदा आम्हाला नामंजूर होता पण काय करणार अडला नारायण….

आता तो निसर्गाचे गुणगान गायला लागला आणि आम्हाला कोसू लागला.

निसर्गाला धरलयंस वेठीला

कंटाळलाय तो तुझ्या अत्याचाराला

कळत कसं नाही तो सूड उगवतोय

कृतघ्न तू तुला धडा शिकवतोय.

निसर्गाला शरण यायला हवं हा धडाच तो शिकवत होता. मनोमन पटलं देखील! निसर्ग  सर्वांना समान वागणूक देणारी सर्वश्रेष्ठ देवता…. आम्ही पुन्हा हात जोडले.

करोना राक्षसाचे आमच्यावरील आरोप म्हणजे जणू एक एक परमाणूच!

माणसानंच माणसाला डंख मारलाय

माणुसकीलाच संपवलस तू .

मोठा समजतोस स्वतःला

असा रे कसा निर्दयी तू?

त्याचा रोख आमच्याच एका प्रजातीकडे आहे हे आम्ही ओळखलं पण त्यात आमचा काय दोष? ओल्याबरोबर सुकंही जळतं म्हणतात ना? तेच खरं.

पहिली लाट माझं येणं

दुसऱ्या लाटेवर स्वार होणं

तिसऱ्या लाटेची भीती असणं

याचं कारण तुझं वागणं

प्रत्येक गोष्टीला तो आम्हाला जबाबदार धरत होता. आम्ही एकमेकाकडे बघू लागलो,स्वतःलाही निरखू लागलो.

शेतकरी तुझा पोशिंदा

शेतात झालाय क्वारनटाईन

निसर्गावर निर्भर तो

झालांय अगदी हवालदिल

खरंच अन्नदाताच तो! त्याला आम्ही कशी वागणूक देतो? त्याच्या अशिक्षित असण्याचा कसा फायदा घेतो? त्याच्या श्रमाची किंमत आम्ही कशी करतो? आम्ही आता लाजून मान खाली घातली.

चंगळवादाचं प्रतीक तू

गरज तुझी संपत नाही

ओरबाडून घ्यायची तुझी वृत्ती

शोषण करायची तुझी प्रवृत्ती

आम्ही गरजेपेक्षा जास्त साठवतो,नासवतो, वाया घालवतो हे आमच्या लक्षात आलंच आहे.आमची झुकलेली मान वर येईचना..

ओढवलेली आर्थिक मंदी

विनाशाची ही तर नांदी

परिस्थिती कोलमडली

मानसिकता बिघडली

आमच्या संसाराचं गणित खरंच बसेना झालंय.ओढाताण व्हायला लागलीये. राक्षस खरंच बोलत होता.

पैसा नाही सर्व काही

माणुसकी असे मोठी

संस्कृती परंपरा प्रथा यांचा

संचय हवा तुझ्या गाठी.

रग्गड पैसा असूनही एकाच तिरडीवर अनेक देह जळत असलेले आम्ही याची देही याची डोळा पाहतो आहोत राक्षस आमचे डोळे उघडू पाहत होता.राक्षसाचा सूर आता समजावणीच्या झाला होता त्यामुळे आमच्याही डोक्यात थोडं थोडं शिरायला लागलं होतं.

आरोग्याला प्रथम मान

अन्नपूर्णेचा करा सन्मान

समतोल आहार नियमित व्यायाम

हाच आहे खरा आयाम

आरोग्याची त्रिसूत्री सांगायलाही तो विसरला नाही आता आम्ही पद्मासन घालून बसलो.

राग लोभ मोह मत्सर

सर्वांना आवर घालून

निर्मळ विचारांना आत घे

मनाचं कवाड उघडून

राक्षस अध्यात्म शिकवू लागला होता.ज्याची आता आम्हाला खरंच गरज होती. आम्ही तल्लीन होऊन ऐकू लागलो.

जान है तो जहान है

मंत्र मोठा या घडीला

डॉक्टर देतात जीवाला जीव

स्वतःचा जीव लावून पणाला

‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती’ असं ज्यांचं वर्णन करावं ते डॉक्टर रोज संकटयुद्धावर असतात. आम्ही सुरक्षित घरात बसतो. याचा विचार न करता आम्ही जे मारहाणीचे प्रकार अवलंबले आहेत,ते पाप आम्ही कुठे फेडावं? आम्ही दोन्ही गालांवर चापट्या मारून तोबा तोबा केलं.

आत्मनिर्भर तुझ्या देशांनं

सिद्ध केलं स्वतःला

सकारात्मक विचारसरणीचा

धडा दिला महासत्तांना

देशाभिमानाची जाणीव झालेल्या आम्ही मान वर केली. जयहिन्दचा नारा लावला. ऊर भरून आलं आमचं..

तुझा ग तुझा म तुझा भ तुझा न…..

असं म्हणत तो आमच्या भोवती फेर धरून नाचू लागला. तो आता आणखी कोणता धडा शिकवणार याकडं आमचं लक्ष लागून राहिलं होतं

लाव पणाला शास्त्र तुझं सोडून भूक-तहान

लाव सत्कारणी वेळ तुझा द्याया जीवनदान

स्वयंसूचना ऐकून तू वाचव हा जहाँ

दे नारा अभिमानानं मेरा भारत महान

असे अनेक धडे देणारा असा हा करोना राक्षस,’विश्वात शांती नांदावी म्हणून पसायदान मागणाऱ्या ज्ञानेश्वरांना स्मरा’ असं तर सांगत नाही ना?

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गोडी अमृताची, झळाळी सुवर्णाची ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

?  विविधा ?

☆ गोडी अमृताची, झळाळी सुवर्णाची ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

१५ ऑगस्ट १९४७ ‘स्वतंत्र भारता’ ची पहिली पहाट झाली. प्राचीवर केशरी रंगाची उधळण, सूर्यकिरणांची शुभ्र प्रभा आणि स्वतंत्र भूमातेची हिरवाई या सर्वांमध्ये असंख्य स्वातंत्र्यवीरांचे शौर्य, त्याग, बलिदान यांचे पवित्र असे ‘नीलचक्र’ यांच्या संगमातून जणू सर्वत्र भारताचा तिरंगा ध्वज लहरत होता. सर्वत्र आनंदी आनंद भरून वाहत होता. स्वतंत्र भारतात सर्वजण मुक्त श्वास घेत होते. स्वातंत्र्यलढ्यातून स्वातंत्र्यप्राप्तीची यशश्री लाभली होती.

हा लढा सोपा नव्हता. असंख्यांचे अतुलनीय शौर्य, असीम त्याग आणि परम बलिदान यामुळे हा दिवस उजाडला होता. म्हणूनच या सर्वांचे मंगल स्मरण आणि त्यांच्या कार्याचे पावित्र्य राखणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. देशहीत जपणाऱ्या चांगल्या कृतीतून त्यांना आपण मानवंदना दिली पाहिजे.

आज देशाच्या स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी होत आहे. देशाने अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. मोठी प्रगती केली आहे. वेगवेगळ्या वाटा चोखाळत यशाची शिखरे गाठली आहेत.

या टप्प्यावर थोडे सिंहावलोकन केले, थोडे सद्य परिस्थितीचे अवलोकन केले तर काही गोष्टींचा आवर्जून विचार करायला हवा हे लक्षात येते.

आपल्या देशाचा प्राचीन इतिहास अतिशय वैभवशाली, समृद्ध असा आहे.नंतर देशाला दीर्घकालीन अशा पारतंत्र्याला तोंड द्यावे लागले. त्यासाठीच दीर्घकालीन स्वातंत्र्यलढा सुरू होता. असंख्य क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी, निस्सीम देशभक्तांच्या परम बलिदानाने, धैर्याने, शौर्याने, त्यागाने देशात स्वातंत्र्याची पहाट उगवली.

स्वातंत्र्यानंतर देशात लोकशाही प्रस्थापित झाली. देशाने या दीर्घ कालखंडात अनेक राजकीय स्थित्यंतरे अनुभवली. मत-मतांतरे, विविध वैचारिक धारा यातून देशाला वाटचाल करावी लागली. तरीही देशाने अखंड प्रगतीची वाट सोडली नाही.

मुळामध्ये आपल्याला आध्यात्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, बौद्धिक, वैचारिक बैठक भक्कम लाभलेली आहे. या पक्क्या पायावर प्रगतीचा आलेख चढत गेला आहे. आधुनिक तंत्रज्ञान, शिक्षण, विज्ञान, वैद्यकशास्त्र, संरक्षण शास्त्र, दळणवळण अशा कितीतरी क्षेत्रात देशाने प्रगतीची नवी नवी शिखरे गाठलेली आहेत. अणूचाचणी आणि अंतराळ संशोधन क्षेत्रातली प्रगती तर अत्युच्च अशी आहे. संशोधन क्षेत्रातही खूप मोठे काम सुरू आहे. आधुनिक तंत्रज्ञानात तर जगातील अव्वल देशांत आपला समावेश आहे.

आत्ताच्या कोव्हिड -१९ च्या महामारीवर स्वतःची लस तयार करून यशस्वी मात करणे हे तर देशाचे अभूतपूर्व यश आहे. जगाच्या इतर देशांमधील, अगदी प्रगत देशांमधील परिस्थिती पाहिल्यावर आपली कामगिरी अगदी कौतुकास्पद आणि अभिमानाचीच आहे.जगण्याच्या प्रत्येक स्तरावर प्रचंड विभिन्नता असणाऱ्या एवढ्या प्रचंड लोकसंख्येच्या आपल्या देशाने जिद्द, प्रामाणिक प्रयत्न आणि धैर्याने सामूहिकरित्या संकटांचा यशस्वी प्रतिकार केलेला आहे.

स्वातंत्र्याबरोबरच सदैव धगधगती सीमा सुरक्षा देशाच्या वाट्याला आलेली आहे. देशाने युद्ध, दहशतवादी कारवाया यांचा धैर्याने सामना करीत यशस्वी प्रतिकार केलेला आहे.  आज लष्कराच्या तिन्ही दलांची अद्ययावत बांधणी, प्रभावी शस्त्रसज्जता यामुळे देशाच्या संरक्षणाच्या बाबतीत मजबूत स्वयंपूर्णता आलेली आहे.

या देशात तरुणाईची संख्या खूप मोठी आहे ही आपली मोठी जमेची बाजू आहे. या हुशार, सक्षम तरुणवर्गाला योग्य ध्येय, योग्य मार्गदर्शन आणि योग्य संधी मिळणे खूप आवश्यक आहे. यासाठी जाणकारांनी, ज्येष्ठांनी प्राधान्याने त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे.  अगदी लहान मुलांना चांगले संस्कार,  देशप्रेमाचे धडे योग्य पद्धतीने दिले पाहिजेत. सोशल मीडिया, नव्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर, त्यातील गंभीर धोके समजावून सांगितले पाहिजेत.

आपल्या देशाला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. तिन्ही ऋतू आपल्याकडे समानच असतात. भरपूर पाऊस, खळाळत्या नद्या, स्वच्छ भरपूर सूर्यप्रकाश, भरपूर हिरवी गर्द वनराई ही आपली समृद्धी आहे. पण वाढत्या शहरीकरण, औद्योगिकीकरणाच्या नादात आपले तिकडे दुर्लक्ष झाले आहे. मोठ्या प्रमाणावर जल, वायू प्रदूषण, प्रचंड प्रमाणात वृक्षतोड याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम दिसत आहे. परिणामतः निसर्गाचे चक्र बिघडते आहे. बदलत्या हवामानाने सतत शेती पिकांचे खूप मोठे नुकसान होते आहे. यासाठी निसर्गाला जपले पाहिजे. नदीजोड प्रकल्प प्रत्यक्षात आणले पाहिजेत. शेतकरी वर्गाची परिस्थिती सुधारून शेती व्यवसाय पुन्हा भरभराटीला आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवेत.

इतरही सर्व गोष्टींमधे देशात सर्व काही चांगलेच, सुरळीत सुरू आहे असे नाही. परकीय शक्तींचे आक्रमण, दहशतवादाचा वाढता धोका या पासून सावध राहायला हवे. मुकाबला करण्यासाठी सतत सज्ज असायला हवे.

इतरही अनेक प्रश्न, अनेक अडचणी आहेत. वाढता भ्रष्टाचार, अंधश्रद्धा, धर्मांधता, अज्ञान, दारिद्र्य, कुपोषण, अस्वच्छता, रोगराई अशा कितीतरी गोष्टींवर खूप काम व्हायला हवे. म्हणजे मग समाजाच्या सर्व स्तरातील अंतर कमी होत एकसंध समाज निर्माण होण्यास मदत होईल. या सर्व अभियानांमध्ये प्रत्येकाने सक्रिय सहभागी होत आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे. म्हणजे मग देश नक्कीच प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर राहील यात शंका नाही.

देशाची एवढी प्रचंड लोकसंख्या, इतक्या विविध प्रांतातील नैसर्गिक, सामाजिक वेगळेपण, विभिन्न भाषा, विचारसरणी, राहणीमान यामुळे कोणतीही गोष्ट सहजासहजी साकार होत नाही. राजकीय हेतूने आरोप-प्रत्यारोप, विरोध अडचणी  ठरलेल्या असतात. यातूनही मार्ग काढत कितीतरी चांगल्या गोष्टी देशाने केलेल्या आहेत. व्यापक देशहीताचा विचार करून लोकांनी यासाठी पुढे आले पाहिजे. जबाबदार नागरिक बनून आपली कर्तव्ये पार पाडली पाहिजेत.  भ्रष्टाचार, हिंसाचार, स्त्रीयांवरील अत्याचार, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान असे कुठलेही दुष्कृत्य घडू नये यासाठी जागरूक राहिले पाहिजे. आपल्या घराप्रमाणेच देशाचीही काळजी घ्यायला हवी. दुसऱ्या देशातील चांगल्या गोष्टींचे गोडवे गात न बसता त्याच गोष्टी आधी आपल्या देशात आपण पाळण्याचा निर्धार केला पाहिजे.

आज आपला देश प्रगतीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कामे, सुधारणा सुरू आहेत. मोठमोठे प्रकल्प, उद्योगधंदे, तंत्रज्ञानाची मोठी झेप घेत देश जगातल्या प्रमुख देशातला महत्त्वाचा देश नक्कीच बनेल. त्यादृष्टीने देशाची वाटचाल सुरू आहे. हे यश आपणा सर्वांचे असणार आहे. यासाठी सरकार, प्रशासन आणि नागरिक यांच्या छान समन्वयाची वज्रमूठ बांधली गेली तर प्रगतीचा हा  गोवर्धन उचलणे शक्य होणार आहे. शेवटी ही श्रीकृष्णाची भूमी आहे.

स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ साजरा करून’शतक महोत्सवी” वर्षात देश पुन्हा वैभवाच्या शिखरावर असेल हे निश्चित.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डाॅ.अनिल अवचट .. एक निखळलेला तारा ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?विविधा ?

☆ डाॅ.अनिल अवचट .. एक निखळलेला तारा ☆ सौ राधिका भांडारकर ☆

कितीतरी तेजस्वी तारे निखळले…

डाॅ.अनिल अवचट हे ही ,पुण्यातील अत्यंत नामांकीत ,साहित्यिक, बहुआयामी व्यक्तीमत्व…!

एक पत्रकार ,सामाजिक कार्यकर्ता,प्रतिभावंत कलावंत काळाच्या पडद्याआड गेला….

त्यांची कितीतरी पुस्तकं ..!!

त्यांची पुस्तकं वाचत असताना ,आपल्या मध्यम वर्गीय जगण्याच्या पलीकडे एक जग आहे,याची जाणीव होते..आपल्या सुरक्षित कोषातून बाहेर पडण्याची ऊर्मी त्यातून मिळते…

पूर्णीया  हे त्यांचं पहिलं पुस्तक.आणि माझं आवडतं पुस्तक.त्यांत त्यांनी बिहारचं अंतरंग उलगडलय्.तिथली समाजव्यवस्था,जमीनदारी,अस्पृश्यता,वेठबिगारी,कंगाली यांचं वर्णन वाचून अक्षरश:हादरायला होते.

ते संवेदनशील आणि मनमोकळे होते. लोकांमधे वावरणारे होते. ते नि:संशय मराठीतले महत्वाचे लेखक ठरतात.त्यांनी आयुष्यभर मिशनर्‍यांसारखं, वंचितांचं, गरिबांचं, कष्टकर्‍यांचं, जगणं, समाजासमोर आणण्याचं काम केलं.

आणि हे सर्व लिखाण प्रत्यक्ष बघून,फिरून ,बोलून!लोकांमधे वावरून केलं आहे.त्यामुळे त्यांत रुक्षपणा,बोजडपणा ,अजिबात नाही. जणू वाचकाचं बोट धरून त्यांना काही दाखवावं असं त्यांचं लेखन…मोकळं मुक्त…जसं बोलणं तसं लिहीणं…त्यामुळे अनिल अवचट यांच्याशी प्रत्यक्ष ओळख नसली तरी ते कधीही अनोळखी वाटले नाहीत…

धागे आडवे उभे,वाघ्या मुरळी,प्रश्न आणि  प्रश्न, वेध ,छेद, संभ्रम , कोंडमारा,माणसं ,अशा कित्येक पुस्तकांतून  हा पैलुदार साहित्यिक भेटत राहिला…त्यांच्या विचारातला लवचिक पणा ,तसा ठामपणाही सतत जाणवला.अस्तित्व टिकवणारी साहित्यनिर्मीती असंच मी म्हणेन…

दलीत पँथर, छात्र युवा संघर्ष वाहिनी, भूमीसेना, हमाल पंचायत वगैरेंशी त्यांचे संबंध होते. नामदेव ढसाळ, राजा ढाले, कुमार सप्तर्षी यांसोबत ते काही काळ या चळवळीत राहिले.पण कार्यकर्त्याचा आपला पिंड नाही हे जाणून ते त्यातून बाहेर पडले पण एकाचवेळी लेखनाच्या माध्यमातून जोडलेले ही राहिले.

मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र ही त्यांचीमहत्वाची सामाजिक ओळख!या त्यांच्या कार्याला पुलंसारख्या आणि अनेक नामांकीत श्रेष्ठींने हात दिले.गेल्या पस्तीस वर्षात त्यांनी कितीतरी हजार व्यसनी लोकांना व्यसनमुक्त करून त्यांचे पुनर्वसन केले.मात्र याचे सर्व श्रेय त्यांनी आपली पत्नी सुनंदाला दिलं.”मी फक्त व्यसनी लोकांच्या जगण्यावर लिहीण्यापुरता…”असे ते म्हणत.

ओरिगामी या कलाछंदांतून ते जगभरच्या बालविश्वाशीही जोडले गेले. त्यांची कित्येक डिझाईन्स ही स्वनिर्मीत  होती… अनेक रुपातले मोर ,गणपती,पक्षी हत्ती घोडे, विदूषक, सांताक्लाॅज्.. त्यांनी स्वत: कागदातून बनवले..जपानमधे ती कायमस्वरुपी प्रदर्शनातही ठेवली आहेत…

ते सुंदर बासरीही वाजवायचे…चित्र काढायचे..

असा हा बहुयामी ,साहित्यिक कलावंत मुक्त मोकळा आणि एक सच्चा माणूस….आज नाही..

विसर्जीत झाला..

त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर…

कागदावरच्या प्रत्येक ठिपक्यात पारदर्शक विसर्जनाचे क्षण तरंगत असतात.

जंगलात ,ऋतुचक्रात हे सामावलेले असते..

झाडाचे पिकले ,पिवळेपान फांदीवरून निसटते.

हवेत तरंगत,मौनाच्या प्रार्थना सारखे जमिनीवर अलगद टेकते…विसर्जित होते.अगदी हळुवारपणे.विसर्जन ही एक  मौलीक गिफ्ट आहे…!!

साहित्यविश्वातले एक सुवर्णपान गळाले…

ज्यांनी जगणे उजळले…

सर्व साहित्यप्रेमींतर्फे या संवेदनशील व्यक्तीमत्वाला प्रेमपूर्वक वंदन…

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तृप्त मी, कृतार्थ मी…. भाग – 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ तृप्त मी, कृतार्थ मी…. भाग – 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

मनोहर फार्म हाउस आज अगदी गजबजून गेलं होतं. जिव्हाळ्याचे नातेवाईक,  स्नेही-संबंधित जमले होते. गेल्या चार वर्षापूर्वी सुहासने आपल्या शाळेतल्या वर्गमित्राकडून प्रकाशकडून ही जमीन विकत घेतली होती. त्याच्या बायकोला कॅन्सर झाला होता आणि तिच्या उपचारांसाठी बर्‍याच पैशांची आवश्यकता होती. उपचाराच्या दरम्यान घरून येण्यासारखे कोणी नव्हते. तिची देखभाल त्यालाच करणं भाग होतं. त्या सगळ्यात त्याची नोकरीही गेली. पाच वर्षापूर्वी सुहासच्या शाळेतील दहावीच्या बॅचने गेटटूगेदर केलं. तेव्हा सुहासला त्याची परिस्थिती कळली. तो पैशासाठी जमीन विकणार असल्याचे तेव्हा म्हणाला. सारखी रजा घ्यावी लागत असल्यामुळे नोकरी कितपत टिकेल, याचीही त्याला शंका वाटत होती. सुहासने मग त्याची जमीन विकत घेतली. पुढे दोन वर्षांनी तिथे फार्म डेव्हलप केला. फार्म हाऊसही बांधलं. त्या सगळ्या इस्टेटीचा व्यवस्थापक म्हणून त्याने प्रकाशलाच नेमलं. जमिनीतून पालेभाज्या,  फळभाज्या,  फुले वगैरे लावून त्याचे उत्पन्नही प्रकाशने घ्यावे, असे त्याने सुचवले. प्रकाशला देवच मदतीला धावून आल्यासारखे वाटले. त्याच्या बायकोची रश्मीची ट्रीटमेंट झाली. आता तिचा धोका टळलाआहे,  असं डॉक्टर म्हणतात. प्रकाश नेहमी म्हणतो, `कृष्ण सुदामाची कथा आपण वाचली होती. सांगतही होतो लहानपणी. पण प्रत्यक्षात असा कृष्ण आपल्या नशिबात येईल, असं कधी वाटलं नव्हतं.’ आता रश्मीची तब्बेतही सुधारलीय.  ती पण भाजीपाला पिकवण्यात,  फुले, हार करणं,  यासारख्या कामात प्रकाशला खूप मदत करते.  सुहासचा एकेकाळचा जिवाभावाचा मित्र त्याचं फार्म आणि फार्म हाऊसचा व्यवस्थापक बनलाय.. त्याच्यावर विश्वास टाकून सुहास गावोगावी, देशोदेशी जायला मोकळा झालाय ॰.

आताशी नातेवाईक, संबंधित म्हणायला लागले होते, `सुहास, तू फार्म हाऊस बांधलंस म्हणे! एकदा बघायला हवं!’  सुहासच्याही मनात येत होतं,  एकदा कुठल्या तरी निमित्ताने आपल्या सगळ्या जिव्हाळ्याच्या माणसांना तिथे बोलवावं आणि सगळ्यांनी एक दिवस मस्त मजेत काढावा. पण काय निमित्त काढावं?  आणि त्याला एकदम आठवलं,  पुढच्या महिन्यात आप्पांना सत्तर वर्षं पूर्ण होताहेत,  तर वहिनींना साठ. शिवाय त्यांच्या लग्नालाही चाळीस वर्षं होताहेत. त्या निमित्ताने एक झकास गेटटूगेदर करू या. याबद्दल सुहास सुखदाशी बोलला,  तेव्हा ती म्हणाली, ‘`याबद्दल माई-आप्पांशी बोलूयात नको! त्यांना एकदम सरप्राईज देऊयात.’ सुहासला ती कल्पना आवडली. रोज वेगवेगळ्या योजना ठरू लागल्या. मिहीर-मिरालाही त्यांनी बजावलं, `माई-आप्पांना काही कळू देऊ नका. त्यांना एकदम…’

`सरप्राईज’ मुलं ओरडली.

मग मुलं रोज एकमेकांशी कानातल्या कानात कुजबुजू लागली. नेत्रपल्लवी, हातवारे होऊ लागले. घरात काही तरी शिजतय,  हे मालतीच्या लक्षात आलं.

`अग, काय चाललय काय तुमचं?’  मालतीनं न राहवूनविचारलं. `काही नाही ग!’ मिहीर मीराला तोडावर बोट ठेवून खुणा करत म्हणाला नाही तर ती पटकन बोलून गेली असती ना! 

 `ती ना, आमची एक गम्मतआहे.’ मीरा म्हणाली.

`आम्हाला पण कळू दे की तुमची गंमत.’

`अंहं! बाबा म्हणाले, कुण्णाला सांगायचं नाही.’

`आई-आप्पांना तर मुळीच नाही.’

`अरे, आम्हाला पण तुमच्या गमतीत घ्या ना!’

`सांगू का?’ मीरा म्हणाली, तशी मिहीरने तिला डोळ्यांनीच ‘गप्प बस’ म्हणुन खुणावले.

`की नाई, या महिन्यात वीक एंडला आपण फार्म हाऊसवर जाणार आहोत. ‘

`असं का? छान! छान!’

`आपणच नाही काही! काका-काकू,  मामा- मामी आणि खूप खूप लोकांना बोलावणार आहेत बाबा’

`हो का? पण का म्हणे?’

बोलता बोलता  मीरा विसरूनच गेली, की आजी आणि आप्पांना काहीच कळू द्यायचं नाहीये. ती पटकन म्हणूनगेली, ` अग, तुझा आणि आप्पांचा वाढदिवस आहे ना! तुझा साठावा. आप्पांचा सत्तरावा. ‘ आणि मग तिने एकदम जीभ चावली.

‘`काय हे मीरा?  सगळं सीक्रेट तू ओपन केलंस.’

 `सॉरी… सॉरी…’ मीरा कान धरत म्हणाली.

`अग, बाबा म्हणाले, त्या निमित्ताने आपण गेटटूगेदर करू या. ‘ 

संध्याकाळी सुहास घरी आल्यावर मालती म्हणाली, `अरे, कसला घाट घातलायस?’

`घाट? कसला?’

`ते काही तरी गेटटूगेदरम्हणत होते मीरा, मिहीर.’

`हां! ते होय?  अग,  बरेच दिवस सगळे म्हणताहेत, सुहास तुझं फार्म हाऊस बघायचंय.’

`ते ठीक आहे. गेटटूगेदर कर तू! पण ते वाढदिवस वगैरे असलं काही नको हं! वाढदिवस आता मुलांचे साजरे कराययचे?  की आमचे? ‘

`बरोबर आहे. आणि पंचाहत्तरी साजरी करतात. सत्तरी नव्हे. ‘ आप्पा म्हणाले.

`आणि लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजराकरतात. चाळीसावा नव्हे. ‘ मालती म्हणाली.

`आम्ही आणखी पाच -दहा वर्षं जगू की नाही,  अशी शंका नाही ना आली तुम्हाला? ‘ आप्पा हसत हसत म्हणाले.

`मुळीच नाही. आणखी पाच वर्षांनी आपण तुमचा अमृत महोत्सव साजरा करू. दहा वर्षांनी तुमच्या लग्नाचा सुवर्ण महोत्सव नि त्याच्या पुढल्या वर्षी सहस्त्रचंद्र दर्शन.’ इती सुखदा. मालतीची लाडकी सून.

क्रमश:….

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महिनाअखेरचे पान – 1 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

 

? विविधा ?

महिनाअखेरचे पान -1 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

महिनाअखेरचे  पान

बघता बघता नवीन वर्षाचा पहिला महिना संपत आला आणि आज तर जानेवारी महिन्याचा शेवटचा दिवस ! इंग्रजी कालगणनेप्रमाणे हा पहिला महिना असला तरी भारतीय कालगणनेप्रमाणे या महिन्यात सुरूवातीला मार्गशीर्ष महिन्याचे काही दिवस येतात व अमावस्येनंतर पौष महिन्याचे दिवस येतात.कालगणनेच्या वेगवेगळ्या पद्धतीमुळे प्रत्येक महिन्यातच असे काही दिवस येत असतात.पण आपण मात्र या दोन्ही पद्धती विचारात घेऊन त्यांना आपलेसे केले आहे.एकीकडे आपल्या कालगणनेप्रमाणे आपण आपले सण,उत्सव,परंपरा जतन करत आलो आहोत तर दुसरीकडे जागतिक कालगणनेला स्विकारून त्यातील नोंदीनुसारही आपण सर्वांबरोबर वाटचाल करत आहोत.

नववर्षाच्या शुभेच्छांचा वर्षाव संपतो ना संपतो तोच आणखी एक गोड संदेश आपल्या कानावर येतो.तो म्हणजे ‘गोड गोड बोला’.संक्रांतीच्या सणाला लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळेच एकमेकांना ‘ तिळगूळ घ्या,गोड बोला ‘ असा आपुलकीचा संदेश देत तिळगूळ  आणि तिळाच्या वड्या वाटून आनंद,स्नेह,प्रेमच वाटत असतात.लहान मुलांचा उत्साह पाहून आपणही लहान होऊन जातो आणि   ‘ग्गो ग्गो बोला’ म्हणत त्यांच्याबरोबर लहान होऊन जातो. संक्रांतीचा आदला दिवस भोगी व पुढचा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो. थंडीच्या या दिवसांत तिळ आणि गूळ यांच महत्व सांगणारा हा सण आपल्या पूर्वजांच्या आरोग्यविषयक दक्षतेचे प्रतिक आहे.आपल्या प्रत्येक सणामागील विज्ञान आपण समजून घेतले तरच या परंपरा,सण जतन करता येतील.

या पारंपारिक सणाव्यतिरिक्त अन्य काही महत्वाच्या घटना या जानेवारी महिन्यात घडून जातात.त्या सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या महत्वाच्या आहेत.याच महिन्यात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले,राजमाता जिजाऊसाहेब ,स्वामी विवेकानंद आणि शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असते.सावित्रीबाई फुले यांनी स्त्री उद्धारासाठी केलेले कार्य लक्षात घेऊन हा दिवस बालिका दिन व महिला मुक्तिदिन म्हणून  साजरा केला जातो तर स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन युवादिन म्हणून साजरा होतो. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे सेनानी महात्मा गांधी,भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री आणि समाजसुधारक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची पुण्यतिथि याच महिन्यात असते.या सर्वच थोर विभूतींचे स्मरण  या निमित्ताने केले जाते.

या महिन्यातीतल आणखी एक महत्वपूर्ण दिवस म्हणजे 26जानेवारी म्हणजेच आपला प्रजासत्ताक दिन!याच दिवशी 1950 साली आपण प्रजासत्ताक राज्यपद्धती स्विकारली व लोकशाहीच्या मार्गाने आपला राजकिय व सामाजिक प्रवास सुरू झाला.

असा हा वर्षाचा पहिला महिना आज संपत आहे आणि उद्यापासून काळाचा प्रवेश पुढील महिन्यात होत आहे.भेटू पुढच्या महिनाअखेरीला. तोपर्यंत गोड गोड बोला…

 

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग २ – खरे शिक्षण ☆ डाॅ.नयना कासखेडीकर

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग २ – खरे शिक्षण ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

[भारतीय संस्कृतीतमध्ये आपल्या जीवनात असणार्‍या गुरूंना अर्थात मार्गदर्शन करणार्‍या व्यक्तिंना अत्यंत महत्वाचे स्थान आहे, हे महत्व आपण शतकानुशतके वेगवेगळ्या पौराणिक, वेदकालीन, ऐतिहासिक काळातील अनेक उदाहरणावरून पाहिले आहे. आध्यात्मिक गुरूंची परंपरा आपल्याकडे आजही टिकून आहे. म्हणून आपली संस्कृतीही टिकून आहे.

एकोणीसाव्या शतकात भारताला नवा मार्ग दाखविणारे आणि भारताला आंतरराष्ट्रीय विचारप्रवाहात आणणारे, भारताबरोबरच सार्‍या विश्वाचे सुद्धा गुरू झालेले स्वामी विवेकानंद.

आपल्या वयाच्या जेमतेम चाळीस वर्षांच्या आयुष्यात, विवेकानंद यांनी  गुरू श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्व पत्करून जगाला वैश्विक आणि व्यावहारिक अध्यात्माची शिकवण दिली आणि धर्म जागरणाचे काम केले, त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना आणि प्रसंगातून स्वामी विवेकानंदांची ओळख या चरित्र मालिकेतून करून देण्याचा हा प्रयत्न आहे.] 

मुलांना कोणत्या शाळेत घालायचं हा मोठा प्रश्न आजच्या पालकांसमोर असतो. खरय की शिक्षण आपल्या आयुष्यातला महत्वाचा घटक असतो. शिक्षण हे औपचारिक आणि अनौपचारिक दोन्हीही. औपचारिक शिक्षण म्हणजे शालेय, महाविद्यालयीन, पुस्तकी शिक्षण, तर अनौपचारिक शिक्षण  म्हणजे घरात कुटुंबात,बाहेर समाजात, आजूबाजूला घडणार्‍य घटना यातून मिळालेले शिक्षण व मोठ्यांनी केलेले  संस्कार सुद्धा. शाळेत घेतलेले पाठ्यपुस्तकांतले शिक्षण म्हणजे निव्वळ  माहिती असते. ब्रिटीशांनी घालून दिलेल्या या शिक्षण पद्धतीमुळे आपल्या देशात जीवनमूल्ये शिकवणार्‍या, व्यवहारज्ञान शिकविणार्‍या गोष्टी विद्यार्थ्यांना मिळत नाहीत. शिक्षण क्षेत्रातली आजची स्थिति बघता स्वार्थ आणि मानवी मूल्यांची घसरण याच वरचढ होत आहेत.

हे तर स्वामी विवेकानंदांना तेंव्हाच कळलं होत. त्यांचाही या शिक्षण पद्धतीला विरोध होता. शिक्षणविषयी त्यांची मते आजही  डोळे उघडणारी आहेत. ते म्हणतात, “ आपल्याला जीवन घडविणारे, माणूस निर्माण करणारे, व चांगले विचार आत्मसात करविणारे शिक्षण हवे आहे. तुम्ही जर चार पाच विचार आत्मसात करून आपल्या जीवनात व आचरणात उतरविलेत तर अवघे ग्रंथालय मुखोद्गत करणार्‍या व्यक्तिपेक्षाही तुमचे शिक्षण सरसच ठरेल. जे शिक्षण सामान्य लोकांमध्ये चारित्र्यबल, सेवा, तत्परता आणि साहस निर्माण करू शकत नाही ते काय कामाचे? यामुळे किल्ली दिलेल्या यंत्रासारखे तुम्ही राबता. ज्यामुळे सामान्य  माणूस स्वताच्या पायावर उभा राहू शकतो, तेच खरे शिक्षण. चारित्र्य घडविणारे, मानसिक बल वाढविणारे, बुद्धी विशाल करणारे आणि स्वावलंबी बनविणारे असे शिक्षण आम्हाला हवे आहे”

हे स्वामी विवेकानंदांचे विचार आजही तंतोतंत लागू आहेत. आजच्या शिक्षण क्षेत्राला आणि देशाला पण .आजच्या घडीला भरकटलेला युवक, टंगळमंगळ करुन वेळ वाया घालविणारा युवक, दिशा नसणारा व ध्येय नसणारा युवक, रस्त्यारस्त्यात, चौकात हास्यविनोद करणारा, छेड छाड करणारा, आंदोलने, मोर्चे यात स्वार्थासाठी व कुणी संगितले म्हणून सहभागी होणारा युवक उद्याच्या भारताची चिंता आहे.

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares