मराठी साहित्य – विविधा ☆ राहूनच  गेलेलं  काही – भाग 1 ☆ सौ. दीपा नारायण पुजारी 

सौ. दीपा नारायण पुजारी

? विविधा ?

☆ राहूनच  गेलेलं  काही – भाग 1 ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

अलीकडं घरी आम्ही दोघेच असतो.हे सकाळी दवाखान्यात जातात. त्यानंतर साधारणपणे मी एकटीच असते. त्यामुळे माझ्या दुपारवर कोणाचाही हक्क नसतो. आजही मी एकटीच दिवाणवर लोळत पडले होते. दाराची बेल वाजली. कोण बाई एवढ्या ऊन्हाचं? असं म्हणत मी दार उघडलं. दारात एक तरुणी उभी होती.

‘हाय’ ती घुसलीच घरात.

माझ्या कपाळावरील आठ्या बघून सुध्दा ती हसत हसत गळ्यातच पडली.

‘कोण तू?’ मी घुश्शातच विचारलं.( खरंतर अगोचर म्हणायचं होतं. पण जीभ आवरली.)

तोपर्यंत ती बया हातपाय पसरुन सोफ्यावर पसरलीही!

मोठ्यानं हसून म्हणाली,’ बघ, विसरलीस ना मला?’

‘छे बाई, काय ते गडगडाटी हसणं? असं का हसतं कुणी?’

आत्तापर्यंत माझं निरीक्षण पूर्ण झालं होतं.

उंच, शेलाटी, जाड- जाड दोन लांब वेण्या; त्याही पुढं घेतलेल्या! बॉटल ग्रीन बेलबॉटम, डबल कॉलरचा लाईट पिस्ता कलरचा थोडा ढगळा टॉप, कानात छोटे छोटे स्पिनर्सवाल्या डुलणाऱ्या रिंग्ज …… अं … अं …. अं.. ही तर..

‘बरोब्बर अगं मी तूच ..ती.. ती कॉलेजमधली दीपा’.

 टाळीसाठी लहानसा हात पुढं आला. मीही टाळी दिली.

‘काय हा अवतार दीपा? साडी, टिकली, बांगड्या.. . ‘

या वाक्याकडं दुर्लक्ष करून स्वयंपाकघरात जाता जाता मी विचारलं… ‘कॉफी?’

‘पळ्ळेल…’

आता मी ही हसत हसत आत वळले.

ती केंव्हाच ओट्यावर चढून पाय हलवत बसली.

‘हे काय नेसकॅफे? ब्र्यू नाही? ‘

‘नाही गं, ह्यांना ब्र्यू नाही आवडत.’

‘हो क्का? ‘

मग ओट्यावर बसूनच कॉफी चे घुटके घेत भरपूर गप्पा झाल्या.

कॉलेजच्या दीपाला मी निरखत राहिले. मला ती न्याहाळत होती. अल्लड, अवखळ, निरागस, दीपा. ठाम पण शांत दीपा. साधी, सरळ तरीही मैत्रिणींच्या घोळक्यात राहणारी, डोळ्यात सुंदर, निरामय, साधीशी स्वप्नं…

तेव्हढ्यात करकचून ब्रेक लागल्याचा आवाज आला. लोकांचा गलका ऐकू येऊ लागला. आरडाओरडा, गाड्यांच्या हॉर्नचे कानठळ्या बसवणारे आवाज…. दोघींनीही कानावर हात ठेवले. ती तर कपाळावर आठ्यांच जाळं घेऊन, हातात डोकं खुपसून बसली.काही वेळानंतर आवाज थोडे कमी झाले.

‘काय ग, असल्या कोलाहलात कुठं घेतलंस घर?’

‘विसरलीस तुला हवं होतं शांत, रमणीय परिसरात छोटंसं घर. कुठं आलीस तू? ‘

‘हं. हे डॉक्टर आहेत ना! मध्यवर्ती ठिकाणी बरं पडत त्यांच्या व्यवसायासाठी.’ मी पुटपुटले.

‘एवढ्या कलकाटात!, बापरे!!. कल्पनाच करवत नाही.

‘सोप्पं जातं त्यांना. खाली दवाखाना वर घर.मुलांनाही शाळा-कॉलेज जवळ. भाजी मार्केट दोन मिनिटांवर.’

‘काय म्हणतेयस ऐकूही येत नाही नीट.’

‘असू दे ग.’

‘काय? क्क क्क काय….?

रस्त्यावरचे आवाज पुन्हा वाढले बघ. धन्य आहेस बाई तू. तूच बैस इथं तुझं घर सांभाळत. मी कलटी घेते.’बाय बाय. करत ती निघूनही गेली. मी दीपा. . दीssपा . .  अशा हाका मारत राहिले.

पण ती कधीच जीना उतरुन पळाली.

मी मात्र सोफ्यात विचार करत बसले. बरोब्बर बोलली ती. तेच तर स्वप्न होतं. लहान असलं तरी चालेल, घर हवं शांत वसाहतीत, गर्दी पासून दूर.. खरंच राहूनच गेलं…

कितीदा बोलूनही दाखवलं ह्यांना की एखाद्या कमी वर्दळीच्या जागी घर होतं मनात माझं, स्वप्नातलं, इवलंसं. इथला रस्ता सकाळी सहा वाजल्यापासूनच बोलू लागतो. गाड्यांची खडखड, हॉर्न ची पीं पीं, सायलेन्सर काढलेल्या बाईक्सचा कर्णकर्कश आवाज. या सगळ्यात पक्ष्यांची किलबिल ऐकू येतच नाही. हलक्याशा झुळूकीनं डोलणाऱ्या पानांची सळसळ वाऱ्यावर विरुन जाते. रेडिओ टीव्ही मोठ्या आवाजात कोकलत असतील तरच कान वेधतात. हा वर्दळीचा रस्ता रात्री बारा वाजेपर्यंत वहात असतो. कर्णकटू सूरात वेडेवाकडे आलाप? गात असतो. ओरडत असतो. मनातलं शांतता वाटणारं घर दूर राहिलंय. हरवून गेलंय. बांधायचंच राहून गेलं… राहूनच गेलं.

क्रमशः ….

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उषाराणी – – निशाराणी ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

उषाराणी – – निशाराणी ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

“थांब,भास्करा,थांब ! असा जाऊ नकोस.

अरे तू येणार या कल्पनेनच मी किती आरक्त झाले होते. आठवतयं ना तुला, माझं ते रूप? हवेत गारवा सुटला होता. तुझ्या लक्ष लक्ष किरणांतील एखादा किरण, वांड मुलासारखा, तुला न सांगताच, आगाऊपणानं पुढं आला होता. पण ते ही बरंच झालं. त्याच्या येण्यानच मला तुझ्या येण्याची चाहूल लागली. मी लगबगीनं उठले. अंगावरची श्यामल वस्त्रे दूर सारली. त्या नादात चांदण्यांची पैंजणं कुठं विखुरली समजलही नाही. मी तुझ्या स्वागतासाठी सज्ज झाले. तुला आवडेल असं शुभ्र वस्त्र परिधान केलं. पण काय सांगू? त्या धवल वस्त्राला लाल, गुलाबी छटा  केव्हा आल्या माझं मलाही समजलं नाही. केवळ तुझ्या येण्याच्या चाहुलीन केवढा फरक पडला होता बघ! तुझं तेजस्वी दर्शन होणार या कल्पनेनच माझी अवघी काया शहारून उठली. चेह-यावर  रक्तिमा चढला.तो सा-या आसमंतात पसरला. खरच मित्रा,तुझ्या दर्शनासाठी मी किती व्याकुळ झालेली असते ते तुला कसं समजणार?

सोन्याच्या पायघड्या घालून तुझ्या आगमनाची वाट  पहात असते. आणि तू असा निष्ठूरपणे निघून जातोस? नाही, भास्करा तुला थांबावच लागेल. माझ्या प्रेमासाठी तरी थांबावच लागेल.

मान्य आहे मला की तुझ्या मागे फिरता फिरता माझं रूप मला बदलावं लागतं. मला हे ही मान्य आहे की थांबणं, गतिहीन होणं हे तुला मान्यच नाही. तुझ्या तेजाला ते शोभणारही नाही. म्हणून तर तुझी वेडी झालेली ही उषाराणी तुझी पाठ सोडायला तयार नाहीय.पण तू तरी  असा निष्ठूर का होतेस? अरे, तुझं तेजच इतकं दिव्य आहे की त्याच्यापुढे माझ्या सौंदर्याचा रक्तिमा. फिका पडून जातो. पण तरीही तुझा सहवास मला हवा आहे.मी अगदी निस्तेज झाले तरी तुझा सहवास मला हवा आहे.

पण तू तर ऐकायला तयारच नाहीस. तुझी पाऊले तर वेगानेच पडत आहेत. क्षणभर मागे वळून पहा. पाहिजे तर मी तुला आवडेल अशा रूपातच पुन्हा येते. तोच रक्तिमा, तोच शितल वारा सारं काही घेऊन येते. तुझी ही उषाराणी, तुझी अभिसारिका बनून, तुझ्या साठी संध्याराणी   होऊन  आली आहे. आता तरी थांब.माझं हे रूप   पाहशील तर तुला नक्कीच आपल्या प्रभातसमयिच्या  मंगल भेटीची आठवण होईल.थांब जरासा.

पण नाही, तू थांबणार नाहीस. सा-या विश्वासाठी वणवण भटकशील. पण माझा एक शब्दही ऐकणार नाहीस. ठीक आहे. तुझी मर्जी. तुझ्यासारख्या सामर्थ्यशाली,तेजस्वी प्रियकराला समजावणं माझ्या कुवती बाहेरचं आहे.

पण एक लक्षात  घे. तू. निघून चाललायस. आता माझ्या जीवनात काळोखच काळोख आहे.ही शुभ्रवस्त्र मला आता परिधान करवत नाहीत. हा रक्तिमाही मला आता नकोसा झालाय. बघता बघता माझा चेहराही काळवंडेल. तुझ्या विरहात माझी अवस्था दयनीय दयनीय होऊन जाईल. माझेच काय, सा-या जगाचे व्यवहार थंडावतील.

तू ही एक लक्षात ठेव.

मी तुझ्या तेजाची पूजक आहे. तुझ्या तेजानं मी दिपून तर जातेच. पण ते तेज तस मी सहजासहजी हातचं सोडणारही नाही.तुझी वाट पाहीन. मला खात्री आहे,तुलाही माझ्या विरहाची किंमत कळेल. आपलं निघून जाणं चुकलं असं तुला वाटेल आणि तू नक्की परत येशील,तुझ्या तेजाचा ताफा   घेऊन येशील मला दिपवायला.

पण……पण मनात अपराधीपणाची भावना बाळगून येशील.माझ्या समोर एकदम येणं तुला जमणार नाही. म्हणूनच आपला एखादा किरण दूत म्हणून पाठवशील, माझा अंदाज घेण्यासाठी.

मला तुझी चाहूल लागेल मी तर काय, प्रेमवेडीच!

तुझ्या येण्याच्या चाहुलीनं मी पुन्हा विरघळेन.

माझ्या कांतिवर पुन्हा एकदा रक्तिमा चढेल.

तुझ्या स्वागतासाठी मी पुन्हा एकदा हसतमुखानं सामोरी येईन.

रानपाखरांना सांगेन मंजुळ गायन करायला.

विरहात तापलेल्या तुझ्या देहाला थंडावा मिळावा म्हणून वा-यालाही आमंत्रण देईन.

मला खात्री आहे, तू नक्की येशील.

उशीरा का होईना, ख-या प्रेमाची किंमत तुला कळेल.

ये, भास्करा, ये.

तुझ्या विरहात काळवंडलेली ही उषाराणी, तिच निशाराणीचं रूप टाकून, चांदण्याचा चंदेरी शालू फेकून, पुन्हा एकदा उषाराणी बनून तुझ्या स्वागतासाठी सज्ज आहे.

मला माहित आहे, हा पाठलाग जीवघेणा असला तरी हे नातं युगायुगांच आहे. कधीच  न संपणारं. अगदी कधीच न संपणारं.!”.

 

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सिंधुसागर ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?विविधा ?

☆ सिंधुसागर ☆ सौ राधिका भांडारकर ☆

कै. सिंधुताई सपकाळ

नवे वर्ष सुरु झाले आणि एका ध्यासपर्वाचा अस्त झाला. मन उदास झाले.नकळत एक पोरकी पोकळी मनात जाणवू लागली.

मृत्यु हे अंतीम सत्य आहे. राम गेले, कृष्ण गेले ,अनेक विभूतीअनंतात विलीन झाल्या..जणू पृथ्वीतलावरचे त्यांचे अवतार कार्य संपले आणि ते निघून गेले.

सिंधुताईंच्या बाबतीतही असेच म्हणावे लागेल.

“..यांनी त्यांचे जीवन अर्पिले हो….”नकळत हेच उद्गार ओठावाटे बाहेर पडतात.

सिंधुताईंचा अचेतन ,शांत देह पाहतांना ,क्षणभर वाटले,या डोहातून शब्द झंकारताहेत…

“देखना एक दिन वक्ख्त भी तेरा गुलाम होगा।

मंझीले उन्हीको मिलती है, जिनके सपनोमे जान होती है..।।

संघर्षमय जीवनात त्यांनी  चैतन्यमय स्वप्ने उराशी बाळगली…

त्यांचं बाळपण खडतर..यौवनात अवहेलना..

ऊपेक्षा ,लाथाडणं ,वणवण ,पायात काटे अन् डोक्यावर प्रखर उन हीच तिच्या जीवनाची खडबडीत वाट…पण ती चालली.निर्धाराने.धडाडीने.तिची जिद्द ,तिचा विश्वास,आणि धुक्यातली तिची स्वप्नं ,आणि नारीशक्ती हेच भांडवल.डोळ्यातून गळलेला एकेक अश्रु तिने जपून ठेवला .कारण त्या अश्रुंची तिला फुले करायची होती…त्या अश्रुंतूनच निर्माण झाले विचारांचे मोती..जे तिला मिळालं नाही त्या प्रेमाचे मोती तिने  उपेक्षित ,अत्याचारित,नाकारलेल्यांवर मनसोक्त उधळले…त्या अनाथांची ती माय झाली..

निराधारांची आधारस्तंभ बनली..

एक गर्भवती स्त्री गोठ्यात एका बालिकेला जन्म देते..दगडाने ठेचून तिची नाळ कापते..स्मशानातल्या चितेवर भाकरी भाजून स्वत:च्या दुग्धधारा  जपते अन् आतल्या आत धुमसते ,पेटते ..एका युद्धासाठी तयार होते.

तिचं सोसणं तिला संपवत नाही तर घडवतं.

बळ देतं ,ताकद देतं..न्याय कुणाकडे मागायचा..

आपणच आपल्या जन्माचा न्याय करायचा ,या प्रेरणेने तिची कूसच रुंदावते…

ती एकाचीच नव्हे तर हजारो मुलांची माय बनते..

त्यांच्यासाठी  शिक्षणाची मोट बांधते.स्वावलंबनाची कास धरते.तिच्या वक्षातला पान्हा मग सागर बनतो..प्रेमाचा सिंधुसागर…..

सागर आटत नाही…

आज देहाने सिंधु अस्तित्वात नाही..

पण या सागरातल्या एकेका थेंबात तिचे अस्तित्व आहे…

बुडे तो सूर्य ऊरे तो आभास..

ज्याला नाही ठाव ते तर आभाळ…

आणि या आभाळमायेपुढे सदैव नतमस्तक…

एक प्रेममय ,सुखमय,शांतीमय समभावी समाज

निर्माण करण्याच्या निर्धाराचं सुगंधी फुल सिंधुचरणी वाहून श्रद्धांजली अर्पित….

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! ☆टे  स्ट  र ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? टे  स्ट  र ! ?

“अगं ऐकलंस का ?”

“का s s य आहे ?”

“चहा घेतलास का तू ?”

“मी तुमच्या सारखी सूर्यवंशी नाही, माझा चहा कधीच झालाय!”

“मग तुला तो आज जरा वेगळा…..”  “अजिबात लागला नाही, नेहमीसारखीच तर त्याची चव आहे.”

“अगं मला तो आज फारच बेचव लागतो आहे, म्हणून विचारलं.”

“हे बघा आज पासून मी केलेल्या कुठल्याही पदार्थाला नांव ठेवणं अजिबात बंद, कळलं ? जे पुढ्यात येईल ते नांव न ठेवता गपचूप खायचं आणि प्यायचं कळलं ?”

“म्हणजे काय, आता आज चहा पुचकावणी झालाय हे पण बोलायची चोरी ?”

“मी आत्ता काय कानडीत बोलले, कुठल्याही पदार्थात चहा पण येतो !”

“आणि मी तसं म्हटलं तर?”

“मी आमच्या हो. मे. सं. कडे तुमची तक्रार करीन हं !”

“आता हे हो मे सं का काय म्हणालीस, ते नक्की काय आहे ते सांगशील का जरा !”

” अहो दोन महिन्या पूर्वीच आम्ही आमचा ‘होम मेकर संघ’ स्थापन केलाय.”

“अगं पण तुमचं बायकांचं ऑलरेडी एक ‘अनाकलनिय महिला मंडळ’ आहे ना ? मग आता हा पुन्हा नवीन संघ कशाला ?”

“अहो उगाच आमच्या मंडळाचे नांव नका खराब करू ! त्याचे नांव ‘अनारकली महिला मंडळ’ आहे!”

“तेच  गं ते, तर ते एक मंडळ असतांना हा नवीन संघ कशाला काढलात ?”

“अहो, असं काय करता, त्या मंडळात नोकरी करणाऱ्या महिलां सुद्धा आहेत ! पण त्यांचे प्रश्न वेगळे आणि आमचे प्रश्न वेगळे.”

“ते कसे काय बुवा ?”

“असं बघा, आमच्या या नवीन होम मेकर संघात फक्त नोकरी न करणाऱ्या बायकांचा, ज्या फक्त ‘रांधा वाढा उष्टी काढा’ अशी माझ्यासारखी घरकामं करतात त्यांचाच समावेश आहे !”

“बरं, पण तुमचे प्रश्न वेगळे म्हणजे काय ?”

“म्हणजे हेच, स्वतःच्या नवऱ्याचे कशावरूनही टोमणे खाणे, आम्ही केलेल्या अन्नाला नांव ठेवून आमचा मानसिक छळ करणे, इत्यादी, इत्यादी !”

“यात कसला मानसिक छळ, मी फक्त चहा….”

“तेच ते, त्यामुळे आम्हां बायकांच्या मनाला किती वेदना होतात ते तुम्हाला कसं कळणार ?”

“काय गं, कुणाच्या डोक्यातून ही संघ काढायची कल्पना आली ?”

“अहो त्या दुसऱ्या मजल्यावरच्या लेले काकू आहेत ना, त्यांनी वकिलीची online परीक्षा दिली होती मागे.”

“बरं मग ?”

“तर अशाच आम्ही दुपारच्या गप्पा मारायला जमलो होतो, तेंव्हा त्यानी ही कल्पना मांडली आणि आम्ही तिथल्या तिथे होम मेकर संघ स्थापून मोकळ्या झालो.”

“बरं बरं ! पण या तुमच्या संघाकडे कुणा बायकोने, स्वतःच्या नवऱ्या विरुद्ध तक्रार केली तर, त्याचा न्याय निवडा कोण करत ?”

“आमच्या संघाच्या अध्यक्षिणबाई, मंथरा टाळकुटे !”

“अगं पण तिला तर तुम्ही सगळ्या बायका खाजगीत आग लावी, चुगलखोर असं म्हणता नां, मग ती कशी काय अध्यक्ष झाली संघाची ?”

“अहो तिचे मिस्टर पूर्वी ख्यातनाम जज होते, एवढं qualification तिला पुरलं अध्यक्ष व्हायला !”

“अस्स अस्स ! अग पण जज साहेब जाऊन तर बरीच वर्ष झाली नां ?”

“म्हणून काय झालं ? जज साहेब हयात असतांना मंथराबाईं बरोबर, त्यांनी न्याय निवडा केलेल्या कितीतरी केसेसेची चर्चा ते करत असत. त्या मुळे मंथराबाईंना अशा केसेस….”

“अशा केसेस म्हणजे ? अग आम्ही नवरे मंडळी काय चोरी, डाका, मारामाऱ्या करणारे वाटलो की काय तुम्हांला ?”

“तसं नाही पण….”

“अगं नुसतं चहा बेचव झालाय, आज आमटी पातळ झाल्ये हे स्वतःच्या बसायकोला बोलणं आणि चोरी, डाका, मारामाऱ्या यात काही फरक आहे का नाही ?”

“आहे नां, पण तुम्ही असं बोलल्यामुळे आमच्या मनाला किती यातना होतात, सगळी मेहनत पाण्यात गेली असं वाटतं त्याच काय ? मग आम्ही न्याय कोणाकडे मागायचा ? म्हणून हा संघ स्थापन केलाय आम्ही.”

“काय गं, आत्ता पर्यंत कोणा कोणाला आणि कसली शिक्षा केल्ये तुमच्या अध्यक्षिण बाईंनी ?”

“अहो कालचीच गोष्ट, काल कर्वे काकूंची तक्रार आली होती त्यांच्या मिस्टरांबद्दल.”

“कसली तक्रार ?”

“अहो काल सकाळच्या जेवणात काकूंच्या हातून आमटीत मीठ जरा जास्त पडलं म्हणून…”

“करव्या तिला बोलला तर काय चुकलं त्याच ?”

“चुकलं म्हणजे, एवढ्याशा कारणावरून कर्वे काकांनी काकूंच्या माहेरचा उद्धार केला ! मग काकू पण लगेच तक्रार घेऊन गेल्या मंथराबाईंकडे आणि अध्यक्षिण बाईंनी त्यांना शिक्षा केली.”

“म्हणजे चूक करवीणीची आणि शिक्षा करव्याला का ?”

“अहो बोलून बोलून त्यांचा मानसिक छळ केल्या बद्दल.”

“काय शिक्षा फार्मावली अध्यक्षिणबाईंनी?”

“कर्वे काकांना काकूंनी रात्री उपाशी ठेवायचं.”

“अगं पण तो डायबेटीसचा पेशंट आहे, त्याला रात्री जेवल्यावर गोळी घ्यायची असते आणि तो रात्री जेवला नाही तर….”

“अहो म्हणूनच उदार होऊन आमच्या अध्यक्षिणबाईंनी, त्यांना रात्री दुधा बरोबर एक पोळी  खायची परवानगी दिली ! तशा प्रेमळ आहेत त्या !”

“कळलं कळलं! आता मला सांग ती मंथरा एकटीच राहते का कोणी….”

“अहो त्यांची नर्मदा नावाची मावशी आहे, ती असते त्यांच्या सोबतीला आणि तीच घरच सगळं काम करते.”

“स्वयंपाक पण ?”

“आता सगळं काम म्हटलं की त्याच्यात स्वयंपाकपण आलाच नां ?”

“मग मला सांग तुमच्या अध्यक्षिणबाईंनां शिक्षा कोण करणार ?”

“त्यांना कशाला शिक्षा ?”

“अगं ती कोण नर्मदा मावशी आहे, तिच्या हातून स्वयंपाक बिघडला, तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे ती कजाग मंथरा, त्यांना बोलल्याशिवाय राहणार आहे का ?”

“अगं बाई खरच की ! हे कसं लक्षात आलं नाही आम्हां बायकांच्या ?”

“कसं लक्षात येणार ? पण यावर माझ्याकडे एक उपाय आहे.”

“काय?”

“आजपासून तू त्या मंथरेकडेच सकाळ संध्यकाळ जेवायला जात जा!”

“म्हणजे काय होईल ?”

“अगं म्हणजे एखाद दिवशी स्वयंपाक बिघडला तर ती मंथरा गुपचूप जेवते का नर्मदेचा उद्धार करते ते कळेल नां.”

“अहो पण असं बरं दिसणार नाही आणि समजा मी गेले त्यांच्याकडे रोज जेवायला तर तुमच्या जेवणाचं काय?”

“मी ठेवीन की बाई !”

“काय?”

“अगं स्वयंपाकाला आणि तिचा स्वयंपाक बिघडला तर तिला हक्काने सुनवीन पण आणि त्यावरून मला त्या करव्या सारखी शिक्षा पण नको भोगायला.”

“वारे वा, घरात एवढी अन्नपूर्णा असतांना स्वयंपाक करायला बाई कशाला? त्या पेक्षा मीच होमेसं चा राजीनामा देते म्हणजे प्रश्नच नाही !”

“अगं पण त्यामुळे तू बिघडवलेल्या अन्नाच्या चवीचा मूळ प्रश्न थोडाच सुटणार आहे.”

“हो, तेही खरंच. मग यावर तुम्हीच एखादा उपाय सांगा, म्हणजे झालं.”

“अगं साधा उपाय आहे आणि तो तू तुमच्या सगळ्या महिला मंडळाला सांगितलास तर तुमचा तो संघ आपोआप बरखास्त झालाच म्हणून समज.”

“काय सांगताय काय, मग लवकर सांगा बघू तो उपाय.”

“तुला माहित्ये, सगळ्या थ्री स्टार, फाईव्ह स्टार, सेवन स्टार हॉटेलात लाख, लाख पागर देऊन एक “टेस्टरची” पोस्ट असते आणि त्याच काम फक्त हॉटेलात लोकांनी जेवणाची ऑर्डर दिल्यावर त्या पदार्थाची चव त्यांच्या ऑर्डरप्रमाणे आहे का नाही, हे चाखून बघणं.”

“पण त्याचा इथे काय….”

“अगं तेच सांगतोय नां, तू एखादा पदार्थ केलास तर तो वाढण्यापुर्वी चाखून बघायचा, म्हणजे मग….”

“त्यात काय कमिजास्त आहे ते कळेल आणि तो वाढण्यापूर्वीच खाणेबल किंवा पिणेबल करता येईल, असंच नां ?”

“अगदी बरोबर, मग आता जरा नवीन फक्कडसा चहा….”

“आत्ता आणते आणि हो आधी त्याची टेस्ट घेऊनच बरं का !”

असं बोलून माझ्या घरची न्युली अपॉइंटेड टेस्टर किचन मधे पळाली आणि मी मनाशी हसत हसत सुटकेचा निश्वास टाकला !

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अधुनिक सावित्री ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?विविधा ?

☆ आधुनिक सावित्री ☆ सौ राधिका भांडारकर ☆

अधुनिक म्हणजे नेमके काय?

जुन्या चालीरीतिंना डावलणे,परंपरा मोडणे,जे वर्षानुवर्षे चालत आले आहे त्याला विरोध दर्शविणे…काहीतरी वेगळं नवीन करणं म्हणजे अधुनिकता का?

खरं म्हणजे अधुनिकता याचा अर्थ कुठल्याही परंपरेच्या संकल्पनेचा शोध घेणं…त्यातली भूमिका ,कारणं,आणि काळ याचा अभ्यास करुन बदलत्या काळाशी वातावरणाशी, जीवनपद्धतीशी त्याची सांगड घालून प्रथेचं उचीत नूतनीकरण करणं म्हणजे अधुनिकीकरण हा अर्थ मला अधिक पटतो…अधुनिकीकरण म्हणजे उच्चाटन नव्हे तर पुनर्बांधणी.

वटपौर्णिमा ह्या मुख्यत्वे स्रियांच्या सणाविषयी काही भाष्य करताना हा विचार महत्वाचा वाटला…

पारंपारिक पद्धतीची वटपौर्णिमा म्हणजे ,पत्नीने पतीला दीर्घायुष मिळावे,आणि हाच पती सात जन्म मिळावा म्हणून केलेले व्रत!!मग ऊपास,वडाची पूजा ,वडाभोवती दोरा गुंडाळत मारलेल्या फेर्‍या..वगैरे वगैरे.. मग त्याच्याशी जोडलेली सत्यवान सावित्रीची कथा…

वास्तविक हिंदु संस्कृतीत कुठल्या ही सणाशी, व्रताशी कुठलीतरी  कथा ही असतेच…मात्र या कथांच्या माध्यमातून एक शास्त्रोक्त वैज्ञानिक दृष्टीकोन असतो. ,तो समजून घेणं म्हणजे अधुनिकता..

आणि आजची स्त्री हा विचार करते.कारण ती शिक्षीत आहे.विचारक्षम आहे.परंपरेतला अंधश्रद्धेचा ,फोलपणाचा भाग ती डावलू शकते…

आजची स्त्रीवटपौर्णिमेच्या दिवशी भले उपास करणार नाही,विधीपूर्वक वडाची पूजा करणार नाही,सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून प्रार्थना करणार नाही ,पण या मागचं सौंदर्य आणि महत्व नक्की जपेल. तेही डोळसपणे…

वटवृक्षाच्या नैसर्गिक सुंदरतेचे ,उपयुक्ततेचं या सणाशी,

व्रताशी घनिष्ठ नातं आहे.पर्यावरणाचा महान संदेश यातून दिला आहे…हा वड सावली देतो,भरपूर प्राणवायु पुरवतो,पक्षी पांखरं पांथस्थ यांचा आधारवड आहे.

याची मुळं मातीची धूप होऊ देत नाही.आणि हे झाड दीर्घायुषी असतं..त्याची पूजा ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असते..त्याचं जतन करण्याची शपथ घेणं असतं..आणि ही जागरुकता असणं ही काळाची गरज आहे…आजची स्त्री हे जाणते…वृक्षसंवर्धन ही हिंदु संस्कृतीत प्रत्येक सणाची मूळ संकल्पना आहे. आणि ती पाळणं म्हणजेच नवा विचार रुजवणं …

मग बाकीच्या बाबी या केवळ मौज,हौस,गंमत करमणुक साजरीकरण या सदरात कुठल्याही अंधश्रद्धेविना जाऊ शकतात…

आजही एखादी व्यक्ती जीवघेण्या आजारातून बरी झाली की आपण त्याच्या पत्नीविषयी चटकन् म्हणतो,”..खरंच सावित्री आहे ती..म्हणूनच तो मरणाशी झुंज जिंकला….”

इथे सावित्री ही प्रतिकात्मक असते.ती शक्ती असते.

सकारात्मकता असते.

आजच शेजारचा अमोल म्हणाला.,”गेले दहा दिवस सीमा क्चारंटाईन आहे .मी घर सांभाळू शकलो.नसेल तिच्याइतकं..पण मनापासून केलं.आज साबुदाण्याची खिचडी तिचा वटपौर्णीमेचा उपास म्हणून बनवलीही..

आणि काकु आज मीही उपास केला..कां विचारा..

तमाम सावित्र्यांना मी आज मानवंदना दिली…

स्त्री मधे नैसर्गिक त्याग,सहनशक्ती ,संयम हे गुण असतात.म्हणून व्रते ही स्त्रियांची मक्तेदारी..पण आज मी तिच्यावतीने हे व्रत करुन स्त्रीत्व काय असतं याचा यत्किंचीत अनुभव घेतला….””

अमोलचं हे वक्तव्य ऐकून वाटलं,हे अधुनिकत्व..

नव्या विचारधारेची  अर्थपूर्ण रुजवण हे संस्कृतीला दिलेलं डोळस वळण…

एक  सुसंस्कार……

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कैकयी, रामायणातील एक महत्त्वाची व्यक्ती…. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

?विविधा ?

☆ कैकयी, रामायणातील एक महत्त्वाची व्यक्ती…. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

रामायण, महाभारत ही महाकाव्ये आपल्या हिंदू संस्कृतीचे भूषण आहेत. लहानपणापासून रामायण-महाभारतातील कथा वाचून आपल्या मनात त्यातील व्यक्तिरेखा विषयी एक विशिष्ट प्रतिमा डोळ्यापुढे उभी राहते. रामायण वाचताना रामाचे आदर्श जीवन, सीतेचे पातिव्रत्य,  लक्ष्मणाचा बंधुभाव तसेच त्या अनुरोधाने येणाऱ्या इतर अनेक व्यक्तिरेखांचे चित्रण आपल्या मनामध्ये ठसले गेलेले असते. कैकयी  ही अशीच रामायणातील महत्त्वाची व्यक्तिरेखा! कैकयी आणि मंथरा या दोघी आपल्या दृष्टीने  रामायणातील खलनायिका, ज्यांच्यामुळे रामाला बारा वर्षे वनवास भोगावा लागला. प्रत्यक्षात कैकयी रामावर नितांत प्रेम करणारी, मनाने अतिशय चांगली अशी आई होती.

  कैकेय देशाचा राजा अश्वपती आणि राणी शुभलक्षणा यांची कन्या म्हणजे कैकयी!  रघुकुल वंशातील राजा दशरथाच्या तीन राण्यांपैकी ही एक! दिसायला अत्यंत देखणी आणि हुशार अशी ही राणी होती! दशरथाची ही प्रिय राणी युद्धावरही त्याच्याबरोबर जात असे. देवदानवांच्या युद्धात देवांच्या सहाय्यासाठी ती दशरथा बरोबर गेली होती, तेव्हा दशरथाच्या रथाचा दांडा तुटला असताना त्या दांड्याला हाताने तोलून धरून तिने रथ तुटण्या-कोसळण्यापासून  वाचवला. युध्द झाल्यावर जेव्हा दशरथाला हे कळले तेव्हा त्याने आनंदित होऊन तिला दोन वर मागण्यास सांगितले. तेव्हा कैकयी ने  ते वर मी योग्य वेळी मागेन असे राजाला सांगितले.

मंथरेच्या बहकावण्यामुळे तिने ते वर मागितले खरे पण त्यातही तिला सुप्त साध्य करायचे होते. दशरथाला पुत्र शोकामुळे मरण येईल, असा श्रावण बाळाच्या वडिलांनी शाप दिला होता. दशरथाला राम किंवा इतर मुलांच्या मृत्यूमुळे शोक होऊ नये यासाठी श्रीरामालाच दूर पाठवायचा निर्णय घेतला, ज्यामुळे श्रीराम ही वाचणार होते व श्रीराम वनवासाला जाणार या दुःखातच दशरथाचे मरण होते.

अशा तऱ्हेने कैकयी ने एक वर मागितला.

 दुसरा हेतू असा होता की त्या काळी ऋषीमुनींना त्रास देणाऱे

अनेक राक्षस, राक्षसी भरत वर्षात होत्या. त्यांचा राम-लक्ष्मण यांच्या हातून मृत्यू व्हावा, आणि सर्व प्रजा राक्षसांच्या त्रासातून मुक्त व्हावी असाही हेतू रामाला वनवासात पाठविण्यामागे होता.

यामुळेच शुर्पणखेसारखी राक्षशीण मारली गेली.कैकयीचे रामा वर खूप प्रेम होते, किंबहुना भरतापेक्षा जास्तच!  संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी राक्षस वध, लंकेचा राजा रावण याचा वध या सर्व गोष्टी श्रीरामांच्या वनवासा मुळेच घडून येणार होत्या. त्यामुळे मंथरेने दिलेला सल्ला मानून कैकयीने रामाला वनवासाला पाठवले व मोठे कार्य करवून घेतले. भरता बरोबर रामाला परत आणण्यासाठी कैकयी स्वतः वनवासात पण गेली होती. ती दुष्ट नव्हती. तो काळच असा होता की या सर्व घटना तिच्या एका वरामुळे घडून गेल्या. श्रीराम परत अयोध्येला आल्यानंतर कौसल्या सुमित्रेबरोबरच कैकयी ने त्यांचे स्वागतच केले!

रामायणातील कैकयीची व्यक्ती रेखा या माहिती मुळे उजळून निघते!

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आठवणींचे ठसे ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ आठवणींचे ठसे ☆ श्री अरविंद लिमये ☆

परखडपणा हा शब्द बोलण्याची पध्दत, वैशिष्ट्य म्हणून सर्रास वापरला जातो.पण त्याचं नेमकेपण एवढ्या मर्यादित अर्थात सामावणारे नाही.

फक्त स्वतःची मते कुणाचाही मुलाहिजा न ठेवता स्पष्ट शब्दात मांडणे हा स्पष्टवक्तेपणा होईल, परखडपणा नाही.

परखडपणा मुख्यतः स्वभाववैशिष्ट्य आणि पर्यायाने व्यक्तिमत्त्वविशेष म्हणूनच ओळखला जातो.स्वभाव या शब्दात विशिष्ट ‘भाव’ अंतर्भूत आहे.’भाव’ म्हणजे मनातील विचारांची, प्रतिक्रियांची व्यक्त होण्यापूर्वीची अव्यक्त अवस्था असे म्हणता येईल. याचाच अर्थ एखाद्या व्यक्तीचा स्वभाव त्याच्या मनोधारणेशी निगडीत असतो हे ओघानेच आले.त्यामुळेच व्यक्तिपरत्त्वे प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत,व्यक्त व्हायची पद्धत वेगवेगळी असते.

परखडपणाला स्पष्ट आणि स्वच्छ विचार अपेक्षित असतात. परखड म्हणजे खरा, सच्चा. अंतर्बाह्य प्रामाणिक.अतिशय प्रांजळ, सरळ आणि मुख्य म्हणजे पूर्वग्रहविरहित. या सारख्या अनेक गुणवैशिष्ट्यांपैकी एखाद्या गुणविशेषाची कमतरतातुध्दा परखडपणाची गुणवत्ता, निखळपणा कमी करणारी ठरत असते.

परखड व्यक्तींसाठी प्रत्येक क्षणच कसोटी पहाणारा असतो. आणि त्या कसोटीला उतरणाऱ्या व्यक्तिंना समाजमनात अत्यंत आदराचे अढळ स्थानही प्राप्त होत असते.

अशा अढळ स्थान प्राप्त झालेल्या अनेक परखड व्यक्तींच्या कार्यकर्तृत्वाच्या आठवणींचे अमीट ठसे समाज मनावर उमटून राहिलेले आहेत. अशा व्यक्ती सत्याची कास धरून कोणत्याही दबावाला बळी न पडता कर्तव्यपूर्तीला सर्वाधिक प्राधान्य देत योग्य निर्णय घ्यायचे धाडस करु धजावायचे. त्या आचार, विचार, साधनशुचिता कर्तव्यकठोरता, सद्सद्विवेक या सर्वांची चाड बाळगणाऱ्या असत.

इतिहासाचा धांडोळा घेताना अशा अनेक व्यक्तींची नावे मनात गर्दी करताहेत. सर्वात प्रथम   उल्लेख करावासा वाटतो तो रामशास्त्री प्रभुणे यांचा. त्यांची निर्भीड न्यायनिष्ठुरता ‘रामशास्त्री बाणा’ म्हणूनच अजरामर झाली ती त्यांच्या परखडपणामुळेच. राजकारणासारख्या दलदलीच्या क्षेत्रातही स्वतःच्या परखडपणामुळे अजरामर ठरलेले नाव म्हणजे तत्कालीन रिझर्व बँकेचे गव्हर्नर आणि नंतर पं. नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळात अर्थमंत्रीपद भूषवणाऱ्या मा.सी.डी.देशमुख यांचे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला पं.नेहरूंचा ठाम विरोध असूनही, सत्याची कास धरून सद्सद्विवेक बुद्धीशी प्रामाणिक रहात त्यांनी संयुक्त महाराष्ट्रच्या चळवळीमागची न्याय्य बाजू परखडपणे पं. नेहरूंपुढे तर मांडलीच,पण त्यांचे मतपरिवर्तन करण्यात यश मिळाले नाही तेव्हा कसोटीची वेळ येताच अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या पाठीशी ते ठामपणे उभेही राहिले. परखडपणाला तत्कालिक क्षणिक फायदा तोट्याचा विचार कधीच भुरळ घालू शकत नाही ते त्यांनी स्वतःच्या कृतीने असे सिद्ध केले होते. प्रशासनात काम करणाऱ्या परखड व्यक्ती म्हणून गो.रा. खैरनार,टी. एन. शेषन, किरण बेदी, अलिकडच्या काळातले तुकाराम मुंढे यांची नावे सहजपणे आठवतात. पत्रकारितेच्या क्षेत्रात तर न.चि. केळकर, टिळक- आगरकर, नानासाहेब परुळेकर यांच्यासारख्या व्यक्तिंनी त्यांच्या परखडपणामुळेच जनमानसातही आदराचे स्थान मिळवलेले आहे. 

साहित्यक्षेत्रातल्या नामवंत लेखिका कै.दुर्गाबाई भागवत यांचाही इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो.आणिबाणीच्या काळात व्यवस्थेविरुध्द ब्र ही उच्चारण्याचे धाडस करायला अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल एरवी असोशीने बोलणाऱ्या तत्कालीन नामवंतांपैकी कुणीही धजावत नसताना परिणामांची पर्वा न करता त्यांनी जाहीरपणे आणिबाणीचा निषेध करण्याचे धारिष्ट्य दाखवले होते. त्यावर्षीच्या कराड येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या.करवीर नगर वाचनमंदिर कोल्हापूरतर्फे झालेल्या त्यांच्या सत्कारप्रसंगी झालेले त्यांचे भाषण हे परखडपणाचे नेमके उदाहरण होते.विशेषत:   साहित्य-संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात ‘समाजमनातील खदखद व्यक्त करणे हे साहित्यिकांचे मुलभूत कर्तव्य आहे ‘ अशी ठाम भूमिका घेऊन मा.यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीतही आणिबाणीवर परखडपणे कडाडून जाहीर टीका करताना त्या डगमगल्या नव्हत्या.

साहित्यिक म्हणून त्या लोकप्रिय होत्याच पण त्यांच्या या परखड,निर्भीड भूमिकेमुळे त्या आदरणीयही ठरल्या होत्या!

परखडपणाला सामान्य- असामान्य,गरीब-श्रीमंत,साक्षर-निरक्षर असा भेदभाव नसतो. सामान्य,गरीब,निरक्षर माणसांचा जगण्याचा परीघ लहान असला तरी त्यांचा निखळ परखडपणा प्रसिध्द व्यक्तींच्या परखडपणाच्या तुलनेत तेवढाच महत्त्वाचा असतो.त्यांच्या मर्यादित वर्तुळात त्यांना आदराचे स्थान असतेच.

आयुष्याच्या वाटचालीत परखडपणाच्या प्रत्येक कसोटीला उतरणाऱ्या अशा व्यक्तीच सुवर्णझळाळी असणारे समाधान प्राप्त करू शकतात. आणि अशाच व्यक्तींच्या आठवणींचे क्षण समाजमनावर  उमटणारे ठसेही कधीच न पुसले जाणारे असतात.

 

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बातमीचा समाचार ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

⭐ बातमीचा समाचार ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

पहाटे पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी रेडियोवर सुरु होणाऱ्या, “मंगल प्रभात” या कार्यक्रमात, बिस्मिल्लाखान यांच्या शहनाईवादना नंतर, सहा वाजता दिल्लीच्या आकाशवाणी केंद्रावरून एक, एक मिनिटाचे, प्रथम हिंदी व नंतर इंग्रजी बातमीपत्र प्रसारित होत असे ! तसेच, संध्याकाळी सात वाजता,

“नमस्कार, आकाशवाणीच हे  पुणे केंद्र आहे ! सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत. आजच्या ठळक…..”

मंडळी, टीव्ही नामक इडियट बॉक्स आजच्या सारखा झोपडपट्टी पासून बंगल्या, बंगल्यात आणि आता तर मोबाईलमधे सुद्धा घुसायच्या आधीची ही गोष्ट ! त्या काळी या दोन “ऑथेँटिक बातमी पत्रावर” अवलंबून असणारी आमची पिढी, रेडियोवरची ही दोन बातमी पत्र ऐकत, ऐकत मोठी झाली ! त्या काळी रेडियो घरात असणं, हे थोडं श्रीमंतीचच लक्षण मानलं जात होतं ! सगळ्याच मध्यमावर्गी्यांना परवडण्या सारखी ती गोष्ट नव्हती ! आमच्या चाळीच्या पंचेचाळीस बिऱ्हाडात जेमतेम दोन ते तीन “मरफीचे” रेडियो होते, यावरून त्याची कल्पना यावी ! या रेडियोच्या बाबतीतल्या गमती जमती सांगण्यासाठी वेगळा लेख, पुढे मागे लिहायचा विचार आहे ! आजचा विषय “बातमी” असल्यामुळे, माझ्या पुढील लेखाच्या विषयाची आगाऊ बातमी देणं, हे मी माझं कर्तव्य समजतो !

पुराण काळात राजाचा एखादा हुकूम अथवा फर्मान रयतेला (तेव्हा सामान्य लोकं रयत म्हणून ओळखले जात, त्यांची जनता नंतरच्या काळात झाली ! ) कळण्यासाठी वेगळी सोय होती ! एक दवंडीवाला, त्याच्या ढोल वाजवणाऱ्या साथीदारासह गांवभर फिरून, तो राजाचा नवीन हुकूम अथवा फर्मान सर्वात शेवटी प्रत्येक गावच्या चावडीवर मोठ्याने वाचून दाखवत असे !

काही राजांनी त्या काळी विशिष्ट पक्षांचा उपयोग, अतिदूर असलेल्या कोणासाठी संदेश (बातमी) देण्यासाठी वापरल्याच, आपल्या वाचनात आलं असेलच ! नसेल तर, “कबुतर जां जां जां” हे गाणं आठवून बघा, म्हणजे मी काय म्हणतो ते लगेच आठवेल ! हल्ली सगळ्यांनाच स्पून फिडींग करायला लागतं, त्याला तुम्ही तरी कसे अवपाद असणार म्हणा ! असो !

काही आफ्रीकन देशात लोकं फार पूर्वी ड्रम सारखे वाद्य विशिष्ट तालात मोठयाने वाजवून एखादी बातमी पुढच्या गावात पोहचवत असत ! नंतर नंतर त्याच काळात “रनर” ची परंपरा सुरु झाली ! रनर म्हणजे गावातला एखादा सगळ्यात जलद धावणारा तरुण, स्वतः दुसऱ्या गावात जाऊन एखादी बातमी तिथल्या प्रमुखाला सांगत असे ! मग त्या गावातला “रनर” तीच बातमी पुढच्या गावात पोहचवत असे !

मराठी वृतपत्रांचा उदय सर्वप्रथम मुंबईत झाला ! मराठीतील पहिले वृतपत्र “दर्पण” या नावाने बाळशास्त्री जांभेकरांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरु केले ! हे वृतपत्र मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत होते जे जेमतेम ८ वर्ष चालून १८४० मधे बंद पडले ! मराठीतील ही दोन्ही वृतपत्रे सुरु करण्याचा मान बाळशास्त्री जांभेकरांना जातो, त्यामुळेच त्यांना ‘मराठी वृतपत्राचे जनक’ मानले जाते !

आता वृत्तपत्राचा उल्लेख आलाच आहे, तर पुढे जाता जाता, मी मागे वाचलेल्या एका इंग्रजी कादंबरीची आठवण झाली ! स्वतः मालक, संपादक असलेला माणूस, “बातमी सम्राट” होण्यासाठी आणि आपल्या पेपरचा खप सगळ्यात जास्त होण्यासाठी  कोणत्या थराला जातो, हे आयरविंग वॉल्लास  या लेखकाने आपल्या “Almighty” (1982) या कादंबरीत कथन केले आहे ! सध्याच्या पत्रकारितेतली, “आपण सर्व प्रथम ही exclusive बातमी आमच्याच चॅनेलवर बघत आहात” अशी खरी, खोटी फुशारकी, त्या काळी त्याने आपल्या वर्तवलेल्या त्याच्या कादंबरीच्या, वेगळ्या अर्थाने जवळ जाणारी आहे, असं आता हल्लीचं पत्रकारितेच रूप बघता मला वाटायला लागलं आहे !

पुढे जसं जसा मानव प्रगत होतं गेला तसं तशी, संपर्काची नव नवीन साधन त्याने आपल्या बुद्धीने विकसित केली ! उदाहरणं द्यायच झालं तर पोस्ट कार्ड अथवा अंतर्देशीय पत्र, जी त्या काळी आपल्या ख्याली खुशालीची बातमी आपल्या दूरच्या नातेवाईकांना कळवण्यासाठी वापरात येवू लागली ! पण नंतर नंतर त्यातील उणीवा कळल्यावर आणि “तार” नामक बातमी पोचवण्याचा जलद उपाय उपलब्ध झाल्यावर(१८५०), त्या दोघांचा वापर कमी कमी होत गेला ! मग टेलिफोनचा शोध लागल्यावर तर जगाच्या एका कोपऱ्यातली बातमी जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात क्षणार्धात पोहचू लागली !

नंतर “दूरदर्शनने” घरात प्रवेश केल्यावर त्यावरील त्या काळात असलेल्या एकाच चॅनेलवर, वेगवेगळ्या बहारदार कार्यक्रमा बरोबरच दिल्या जाणाऱ्या बातम्या लोकं बघायला लागले आणि त्यावर खात्रीने विश्वास ठेवू लागले ! बातम्या कशा द्याव्यात आणि कशा देवू नयेत याच आज सुद्धा उत्तम उदाहरण म्हणजे, दूरदर्शनच्या बातम्या आणि सध्या इतर कुठल्याही पेव फुटलेल्या न्यूज चॅनेलवरील बातम्या ! या बाबतीत जास्त न बोललेच बरं ! आणि आता तर काय मोबाईल नामक यंत्राने सारे जगच, सगळे लोकं आपापल्या खिशात घेऊनच आज काल वावरत असतात !  त्यामुळे जगाच्या एखाद्या टोकाला घडतं असणाऱ्या घटनेची बातमी आपण बसल्या जागी नुसती ऐकूच नाही, तर प्रत्यक्ष पाहूही शकतो !

पण विज्ञानाच्या कुठल्याही शोधाला, एक चांगली आणि एक वाईट बाजू असतेच असते ! जसं ऍटोमिक एनर्जीचा शोध लागल्यावर काहींनी त्या पासून सर्वनाश करणारा ऍटोम बॉम्ब बनवला तर काहींनी त्याचाच उपयोग ऊर्जा निर्मितीसाठी केला ! आता मोबाईल मध्ये वेगवेगळे ऍपस, अल्लाउदिनच्या जादूच्या दिव्या सारखे शिरल्यावर, त्याच्या कडून चांगली काम करून घेणाऱ्या लोकां पेक्षा त्याच्या कडून वाईट कामंच लोकं जास्त करून घेवू लागलेत ! काही जण स्वतःच एखादी बातमी क्रिएट करून ती पोस्ट करू लागलेत ! आणि त्या बातमीची कुठलीच शहानिशा न करता त्यांचे मित्र ती आपापल्या मित्रांना पुढे पाठवून मोकळे होऊ लागलेत ! असो, व्यक्ती तितक्या प्रकृती !

मंडळी, आपल्याला एखादी बातमी कुणाकडूनही (अगदी माझ्याकडून देखील!) कळली तरी ती पुढे ढकलतांना, कृपया त्याची शहानिशा करूनच पुढे ढकला ही विनंती !

शुभं भवतु !

© श्री प्रमोद वामन वर्तक

ता. क. – वर उल्लेख केलेल्या बातमी पत्राच्या निवेदिका, श्रीमती सुधा नरवणे या, ज्यांची नुकतीच CDS म्हणून नेमणूक झाली त्या  मनोज मुकुंद नरवणे यांच्या मातोश्री !

 

संपर्क – (सिंगापूर) +6594708959, मो – 9892561086, ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बदलूया का थोडं… ☆ प्रस्तुती – सौ. मेधा सहस्रबुद्धे

?  विविधा ?

☆ बदलूया का थोडं… ☆ प्रस्तुती – सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆ 

चार खुंट्या ठोकून दोन पाटल्या टाकून अख्ख्या कुटुंबाचं आणि पाहुण्या रावण्यांचं  पण मस्त भागत होतं . तर कुठून ही श्रीमंती आली न मॉड्युलर kitchen चा घाट घराघरात पोचला देव जाणे. अख्खा दिवस जरी राबलं तरी स्वैपाकघर काही स्वच्छ वाटत नाही, काही ना काही उरलेलच असतं, बरं, बाई ची मदत असेल तर ठीक चालू होतं, पण कोविड पासून तोही मदतीचा मार्ग बंद झाला. मागच्या अंगणात टोपलभर भांडी राखेने अन नारळाच्या शेंड्यानी कचाकच घासून व्हायची, खरकटं पाणी अंगणातल्या झाडात पडायचं, आणि कडकडीत उन्हात भांडी मस्त पैकी निर्जंतुक होऊन जायची. आता सिंक च्या टिचभर ओलसर जागेत घासायची अन नुसती पाणी निथळत स्वैपाकघरातच ठेवायची, भांडीच काय पण कपड्यांना पण ऊन लागत नाही, निर्जंतुकीकरण तर दूरच राहिलं.

दिवाळीत सगळ्या गाद्या,उशा दुलया कड कड वाळून व्हायच्या, उन्हात न्हाऊन निघायच्या, आता पापड, मूग वड्या तर सोडाच, धान्यांना उन्हं लागत नाहीत तिथे अंथरूण पांघरूण दूरच राहिले.

सकाळ संध्याकाळ घर झाडून कचरा अंगणातून जरा बाहेर फेकला की सगळं कसं लख्ख व्हायचं, आता त्या पांढऱ्या चकचकीत फरशीवर चार वेळा झाडले अन तीन वेळा पुसले तरी केसांचे भ्रमण मंडळ तर कधी एकटा दुकटां केस,  आरामात लोळत पडून असतात घरभर.

न्हाणीघर वेगळं तर टॉयलेट वेगळं, तेही घरापासून जरा ८ पावलं दूर मागच्या वाड्यात… उंचावर… आणि आता असते किचन च्या भिंतीला लागून ,तेही दोन्ही विधी एकत्र करायची ‘सोय?’ त्यातही एका कुटुंबात २, ३ असे बाथरूम्स … आपण प्रगतीकडे चाललोय का अधोगती कडे?

मोठ्या हौशीने अवन (ओव्हन)  घ्यायचं अन फक्त शिळं अन्न गरम करायला वापरायचं, कुणी बरं एवढी दुर्बुद्धी दिली असेल आपल्याला.. काही बोटावर मोजण्याइतके असतीलही हुशार पण उरलेली मेजॉरिटी अशीच.. रीहीटींग वाली…

त्यातही झुरळे जागोजागी, त्या मॉड्युलर किचनच्या कानाकोपऱ्यात, सिंक, अन फ्रिज काय काय म्हणू नवे घ्यावीत… कितीही नायनाट करायचा म्हटलं तरी ह्यांची जनसंख्या नाहीच येत आटोक्यात.. कधी कधी वाटतंय घराचे छप्पर कापून काढावे अन सूर्याला म्हणावं ओत तुझी आग बाबा, होऊ दे सगळं लख्ख..

चार गज लावून अर्धा साडीचा पडदा लावलेली खिडकी पण कमी प्रकाश अन हवा देत नव्हतीच तेव्हाही  आणि आता भल्या मोठ्या स्लाईडिंग खिडक्या… म्हणजे बस घासत काच अन खालची सगळी न निघणारी धूळ माती, दात घासायच्या ब्रश नी … सगळाच गोंधळ..

दिवाळीत एखादा ड्रेस मिळायचा ! मोजून २,४ कपडे… आता ४ कपाटं पण पुरत नाहीत कपडे ठेवायला, वरतून काही प्रसंग आला म्हणजे घालायला काही सापडत नाही हे वेगळेच…एकुलती एक परदेशात वारी करायची म्हटली तरी थर्मल चे २ , ३ सेट माणशी अन त्या महागड्या मोठ्याच्या मोठ्या ब्यागा पण… वैताग नुसता…

पोरांचा वाढदिवस म्हणजे तर विचारूच नका… इतके म्हणून ते बिनकामाचे गिफ्ट जमा होतात जणू गिफ्ट शॉप्सच्या पालन पोषणाची जबाबदारी आपणच घेतलीये… त्यात ते रिटर्न गिफ्ट चे फॅड… हजारोंच्या वर पेन पेन्सिल शार्पनेर अन खोडरबर अन पाऊच अन रंगीत पेंसिल्स … चित्रांची अन रंग भरायची  बुक्स… सगळा कचरा… बरं इतकी सुबत्ता पाहून आपल्या सारखी एका पेनावर जीव लावून वर्षानुवर्षे काढणारी पिढी कशी निपजेल… मग अजूनच चिडचिड! आपलीच घुसमट…एका पिढीत प्रचंड काटकसर तर दुसऱ्या पिढीत प्रचंड सुब्बत्ता, उधळ माधळ… कसे करायचे सहन… बरं  थोडं जुनं थोडं नवं करता करता नाकी नऊ आलेत आता ..

आपण बदलू या का थोडं ?

जेवढं जमेल तेवढं ?  

ते, निदान बर्थडेला पैसे देऊ या, गिफ्ट्स नकोत.. रिटर्न गिफ्ट मध्ये लगेच वापरल्या जातील अशा वस्तू देऊ या, जसे दिवाळी असेल तर ५ दिवे, उन्हाळा असेल तर कॅप, काहीतरी कल्पकता… छोटसं झाड वगैरे… ते प्लास्टिक चे डबे अन अभ्यासाचं साहित्य नको ना आता.. ते पुढच्या ७ पिढ्याना पुरेल इतके झालेत आता सर्वांच्या घरी… अजून काय काय बदलता येऊ शकेल… सुचवा बरं जरा, अन पाळूया आपण सर्वच तसे ..खूप झालं हे आता

…एक वैतागलेली गृहिणी

प्रस्तुती…सौ. मेधा सहस्रबुद्धे

पुणे

मो  9420861468

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ इतिहासाचार्य – विश्वनाथ काशिनाथ राजवाडे ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

?  विविधा ?

☆ इतिहासाचार्य – विश्वनाथ काशिनाथ राजवाडे ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

मराठी इतिहासाचे अत्यंत प्रतिभावान, व्यासंगी, दृढनिश्चयी, निष्ठावान इतिहास संशोधक म्हणजे विश्वनाथ काशिनाथ राजवाडे.  महाराष्ट्रातील इतिहास संशोधनाचे ते पहिले पुरस्कर्ते होत. एवढ्या प्रचंड मोठ्या कार्यामुळे ‘इतिहासाचार्य’ म्हणूनच ते ओळखले जातात. महाराष्ट्राच्या विचार विश्वात त्यांचा मोठा दरारा, दबदबा होता.

विविध विषयांवर त्यांनी संशोधन केले. इतिहास, गणित, मानववंशशास्त्र, विज्ञान, भौतिकशास्त्र, संस्कृत, भाषाशास्त्र अशा अनेक विषयांवर त्यांचे प्रभुत्व होते. इतिहास हा भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन असते. त्यासाठी अस्सल कागदपत्रांच्या आधारे आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे ही त्यांची स्पष्ट विचारधारा होती. ऐतिहासिक साधनांच्या आणि प्राचीन साहित्याच्या शोधासाठी त्यांनी अखंड भ्रमंती केली. प्राचीन अवशेष आणि जुनी दप्तरे गोळा केली. त्यांच्या अभ्यासातून, संशोधनातून इतिहास लेखन केले. संशोधन, संकलन, संपादन आणि समीक्षा या इतिहासाच्या सर्व टप्प्यात ते शेवटपर्यंत कार्यरत होते. त्यांचे लिखाण नवीन विचारांचे खाद्य पुरवणारे आणि लोकविलक्षण निष्कर्षांचे असायचे. संशोधनाचा अफाट व्यासंग होता.

‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ या ग्रंथाचे बावीस खंड प्रसिद्ध आहेत.ते मराठा साम्राज्याच्या इतिहास अभ्यासासाठी महत्त्वाचे साधन बनलेले आहेत. त्यातील काही खंडांना त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावना संपादनापेक्षा जास्त गाजल्या.संशोधनात ज्ञानेश्वरीची जुनी प्रत मिळाल्यावर तिला शंभर पानांची प्रस्तावना लिहिली. ‘ज्ञानेश्वरीतील व्याकरण’ हा ग्रंथ लिहिला.

महाराष्ट्राचा वसाहत काळ’, ‘राधा माधव’, ‘विलास चंपू’, ‘महिकावतीची बखर’ इत्यादी लेखन त्यांच्या प्रतिभा संपन्नतेची साक्ष देते.  प्रसिद्ध वा अप्रसिद्ध कोणत्याच ग्रंथसंपदेवर त्यांनी हक्क राखून ठेवले नाहीत. ही त्यांची निस्पृहता अतुलनीय आहे. संपूर्ण वाङमय संशोधनात्मक असून त्यातून बुद्धिवादी व शास्त्रीय पद्धतीचे धडे दिले.

मराठी भाषा व मराठी वाङमय या विषयी त्यांची जिज्ञासुवृत्ती होती. मातृभाषेतच लिहिण्याचा बाणा त्यांनी आयुष्यभर पाळला. ते म्हणत, “ज्ञानार्जनाची हौस असेल तर माझी मराठी भाषा पाश्चिमात्य लोक शिकतील. माझ्या ग्रंथांची पूजा करतील. मी परकीय भाषेत माझा ग्रंथ लिहिणार नाही. मी कीर्तीला हपापलेलो नाही.”   

मराठीतून इतिहास, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण इत्यादी बहुविध विषयांवर व्यासंगी संशोधन आणि लेखन केले. भाषा ही संस्कृतीचे प्रतीक आणि भाषेतील शब्द इतिहासाचे विश्वसनीय साधन वाटे.मराठीचे विवेचनात्मक व्याकरण आणि ऐतिहासिक व्याकरण यांच्या त्यांनी व्याख्या केल्या. ऐतिहासिक व्याकरणाच्या सहाय्याने शब्दांची प्राकृत, संस्कृत, वेदकालीन, पूर्ववैदिक, पूर्वपूर्ववैदिक भाषेतील रूपांचे संशोधन केले. समाजशास्त्राचा ही अभ्यास केला.

स्वभाषेच्या, स्वदेशाच्या इतिहासातून स्वाभिमान जागृत करणे आणि सर्वसामान्यांना संघर्षास प्रवृत्त करणे हे त्यांनी आपल्या कामाचे ध्येय ठरवले होते. असे हे कीर्ती, संपत्ती, अधिकार यांचा हा मोह टाळून अखंड ज्ञानोपासना करणारे, प्रचंड व्यासंग असणारे प्रतिभाशाली व्यक्तिमत्व ३१ डिसेंबर १९२६ रोजी निवर्तले.

त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.?

 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares