मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! ☆ ललाटी इथे चिंता ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? ललाटी इथे चिंता ! ??

“गुड मॉर्निंग पंत !”

“सुप्रभात, सुप्रभात, अग ऐकलंस का, जरा दोन कप चहा कर मस्त आलं वगैरे टाकून, मोऱ्या आलाय !”

“नको पंत, आत्ताच घरी घेवून आलोय.  तुमचा पेपर देण्यासाठी आलो होतो.”

“तो देशील रे, पण आज तुझं थोडं बौद्धिक घेणार आहे, म्हणून म्हटलं जरा आल्याचा चहा घेतलास तर मेंदूला तरतरी येईल तुझ्या !”

“बौद्धिक कसलं पंत ?”

“अरे तुम्ही लोक आजकाल ते PJ वगैरे करता ना, तसलाच एक PJ मी तुला….”

“विचारा ना विचारा पंत, आपल्या चाळीत मला PJ एक्स्पर्ट म्हणूनच ओळखतात, हे ठाऊक असेलच तुम्हांला ?”

“अस्स, मग मला सांग ‘कनवटीच्या पैशाला’ काय म्हणतात ?”

“कनवट म्हणजे…. “

“भले, इथपासूनच बोंब आहे सगळी तुझी मोऱ्या, मग तू काय उत्तर देणार कप्पाळ !”

“तस नाही पंत, पण कनवट हा  शब्द तसा कानावरून गेला नाही म्हणून… “

“बर, तुला सांगतो कनवट म्हणजे कंबर.”

“ओके, मग सोप आहे पंत. कनवट म्हणजे कंबर आणि सम म्हणजे पैसा, म्हणजे उत्तर  ‘कंबरसम’ काय बरोबर ना ?”

“मानलं बुवा तुला, खरच एक्सपर्ट दिसतोयस तू या पीजेच्या गेम मधे.”

“पण पंत आज एकदम सकाळी सकाळी पैशाच्या गोष्टी? “

“अरे या जगात पैशा पेक्षा अनेक चांगल्या गोष्टी आहेत पण त्या घेण्यासाठी पण पैसाच लागतो रे !”

“वा पंत व्वा, काय बोललात ? जरा परत सांगता, म्हणजे नीट लिहून घेतो.”

“अरे, असे मी कुठंतरी वाचल होत मोऱ्या, ते आठवलं म्हणून तुला सांगितले इतकंच.”

“असं होय, मला वाटले हे तुमचंच वाक्य आहे की काय !”

“अरे मोऱ्या असं बघ आमची पिढीच निराळी. दुसऱ्याचे काही आपल्या नावांवर खपवण्या इतपत आमचे मन, तुमच्या तरुण पिढी इतके अजून तरी निर्ढावलेले नाही.”

“तेही खरच म्हणा, पण आज एकदम पैशाच्या गोष्टी आणि ह्या सगळ्या रिसिटस कसल्या दिसतायत ? “

“अरे ह्या सगळ्या इन्शुरन्सचे प्रीमियम भरल्याच्या रिसिटस आहेत.”

“पण पंत, ह्या सगळ्या LIC च्याच रिसिटस दिसतायत.”

“अरे आमच्या वेळेस आजच्या सारखे तुमचे पॉलिसी बाझार नव्हते बर. तेव्हा इन्व्हेस्टमेंट करायला फक्त PF आणि एकच एक विश्वासार्ह LIC काय ती होती. तेव्हा PF ला चांगला इंटरेस्ट रेट मिळायचा. तुला एक गंमत सांगू ?”

“सांगा ना पंत !”

“अरे आमच्या बँकेत जर का नवरा बायको दोघेही कामाला असतील नां, तर एकाचा 90% पगार PF मधे ठेवणारी अनेक जोडपी होती त्या काळी आमच्या बँकेत.”

“काय सांगता काय पंत? पण मग संसार कसा चालायचा त्यांचा ?”

“अरे एकाचा पगार होताच ना पुरेसा त्यासाठी, मग.”

“पंत तुम्ही पण PF मधे…”

“अजिबात नाही, रिटायर होई पर्यंत माझी मिनिमम काँट्रीब्युशन होती PF मधे 10% ची.”

“काय सांगता काय पंत, मग तुम्ही इन्व्हेस्टमेंट कशात करत होतात त्या वेळेस ?”

“माझ गणित थोडं वेगळं होत.”

“ते कसं काय ?”

“मी LIC च्या मनी बॅक पॉलिसी घेत होतो, त्यात पण टॅक्स बेनिफिट PF एवढाच मिळायचा.”

“बरोबर ! “

“आणि ३ किंवा ५ वर्षांनीं पैसे मिळाले की त्याची NSC घ्यायचो तेव्हा! मग काय 6 वर्षात पैसे डबल आणि वर त्याचा पण टॅक्स रिबेट  मिळायचा. पण त्यात दुसरी एक महत्वाची जमेची बाजू पण होती मोऱ्या.”

“ती कोणती ? “

“अरे असं बघ, मी जरी 90% PF काँट्रीब्युट केला असता आणि जर का माझे काही बरे वाईट झाले असते तर हिला माझे PF चे पैसे आणि त्यावरचे व्याजच मिळाले असते, पण इन्शुरन्स काढल्यामुळे जर का तसा प्रसंग आला असता तर त्याच्या कितीतरी पट…. “

“हो, कळलं मला, पण तेव्हा शेअर मार्केट हा सुद्धा पर्याय उपलब्ध….. “

“अब्रम्हण्यम्, अब्रम्हण्यम् ! अरे त्या वेळेस शेअर मार्केट म्हणजे सट्टा, जुगार अशी आमच्या भटा ब्राम्हणांची समजूत, त्याच्या वाऱ्याला सुद्धा फिरकायला बंदी होती घरून !”

“काय सांगता काय पंत, मार्केट म्हणजे सट्टा… “

“अरे अशी त्या वेळेस मध्यमवर्गीय लोकात समजूत होती खरी आणि तुला सांगतो, अरे फोर्टला बँकेत असतांना मी “लिधा – बेचा”चा कलकलाट या कानांनी ऐकलाय बर. तुमचा तो मार्केटचा टॉवर आणि ऑनलाईन ट्रेडिंग आत्ता आत्ता सुरु झाले.  आताच्या सारखे घर बसल्या बोल्टवर तेव्हा लाखोंचे व्यवहार होत नव्हते !  तुम्हाला शेअर विकायचे असतील किंवा विकत घ्यायचे असतील तर तो व्यवहार सटोडिया मार्फतच करावा लागायचा.”

“अरे बापरे, मग कठीणच होता तो काळ इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने.”

“अरे म्हणून तर मी LIC मधेच जास्तीत जास्त पैसे गुंतवले तेव्हा आणि लोकांनाही तसेच सांगत होतो. पण आता हल्लीच्या LIC बद्दलच्या उलट सुलट बातम्या ऐकून तसे करण्याचे धाडस होत नाही एव्हढे मात्र खरे.”

“हो मी पण ऐकून आहे त्याबद्दल, बघूया काय काय होते ते.  पण पंत एक सांगा, आजच्या ललाटी इथे चिंता ! या मथळ्याचा काय संबंध ते नाही लक्षात आलं.”

“अरे स्वतःला एव्हढा PJ एक्स्पर्ट म्हणवतोस ना मग सांग बर या मथळ्यात काय गुपित दडले आहे ते.”

“नाही पंत, हरलो, आता तुम्हीच ते सांगून माझी सुटका करा म्हणजे झालं.”

“अरे सध्या, ‘योग क्षेमं वहाम्यहंच’ काही क्षेम दिसत नाही म्हणून तसा मथळा दिलाय.”

“असं, असं !”

“आणि दुसरं म्हणजे Llati Ithe Chinta ! असे जर इंग्रजीमधे लिहिलेस तर त्यांच्या अद्याक्षरा पासून काय तयार होते, L I C !”

“कमाल झाली तुमची पंत ! आजपासून आपल्या चाळीचे नवे PJ एक्स्पर्ट म्हणून मी तुमचं नांव घोषित करतो !”

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खूप छान वाटतयं….लेखक अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री संतोष म्हैसकर

? विविधा ? 

☆ खूप छान वाटतयं….लेखक अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री संतोष म्हैसकर

बालपणी ज्यांना चिऊ काऊ चे घास भरवले,

आज ते मला, आई खाऊन बघ छान आहे, म्हणून

आपल्या घासातला घास भरवतात..

खूप छान वाटतय..

 

इवल्याशा पाठीवरचं दप्तर मी उचलून घेई,

आज माझ्या हातातले ओझे उचलायला धावत येतात..

खूप छान वाटतय..

 

ज्यांची बोटं धरुन अक्षरांशी ओळख करून दिली,

आज ते माझी नवीन टेक्नोलॉजीशी ओळख करुन देतात..

किती मजा वाटते आहे..

 

ज्यांना हात धरुन रस्ता ओलंडला,

आज ते माझा हात धरुन रस्ता ओलंडतात,

हातांची अदलाबदल कधी झाली कळलंच नाही..

पण खूप छान वाटतय..

 

चालताना उड्या मारु नकोस रे पडशील, असं म्हणणारी मी..

आणि आज, आई हळू पुढे खड्डा आहे म्हणणारे ते,

एवढा प्रवास कधी झाला कळलंच नाही..

पण खूप छान वाटतय..

 

रिक्षाने जाताना त्याना आतल्या बाजूला बसवणारी मी..

आज जागा केव्हा बदलल्या समजलंच नाही..

पण खूप छान वाटतंय

 

प्रयत्न करून बघ, शिकवलंय ना मी तुला, असे म्हणणारी मी आणि आज… सोपंय ग, एकदा शिकलीस की येईल तुला, असे सांगणारे ते….

किती गम्मत वाटते आहे..

 

ज्यांचा बरोबर बडबड गीते आणि छान छान गोष्टी ऐकल्या, आज ते आई हे गाणं ऐकलंस का, बीट्स आवडतील बघ तुला ,असं म्हणतात तेव्हा काय सांगू काय वाटतं….*

लय भारी वाटतंय..

 

शाळेच्या पिकनीकला जाताना, बस मध्ये बसवून देणारी मी आणि आज मी प्रवासाला जाताना मला बस मध्ये बसवणारे ते..

शब्द तेच, काळजी तीच, भूमिका बदलल्या

किती मस्त वाटतय.|

 

त्यांना काही होत असेल तर, घाबरणारी मी आणि मला जरा बरं नसलं तर, कासावीस होणारे ते..

किती कृतकृत्य वाटतंय..

 

लहानपणी त्यांचा अनाठायी हट्ट कसा चुकीचा आहे, हे सांगणारी मी, आज माझे एखादे मत कसे चुकीचे आहे हे माझे मन न दुखावता मला पटवण्याचा प्रयत्न करतात..

किती अभिमान वाटतो..

 

मुले घरात दिसली नाहीत तर, कासावीस होणारे बाबा आणि आज, हे काय, बाबा अजून आले नाहीत म्हणणारी मुलं..

परत शब्द तेच, काळजी तीच, भूमिका कधी बदलल्या समजलंच नाही..

इवलेसे गळ्यात पडणारे हात, आज आधार द्यायला खंबीर झाले..

खूप छान वाटतंय..

 

नकळत संस्कार घडले,

नकळत भूमिका बदलल्या,

नकळत त्यांच्यात एक संवेदनशील पती आणि हळूवार पिता आकार घेऊ लागला..

खूप धन्य वाटतंय..

 

प्रस्तुती – श्री संतोष म्हैसकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ व ज न ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

⭐ व ज न ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“मंत्री साहेबांनी ट्रस्टिंवर वजन टाकलं, म्हणून कामाचा ठेका मिळाला !”

वजन ! किती साधा, सरळ, कुठल्याही काना, मात्रा, वेलांटीच स्वतः वजन न वाहणारा शब्द !  पण तो उच्चारतांना आपल्याला त्याच वजन जाणवतं !

आता कुणा व्यक्तीच्या शब्दाला समाजात किती वजन आहे, हे माझ्या मते त्या व्यक्तीच्या समाजात असलेल्या खऱ्या, खोट्या प्रतिष्ठवर अवलंबून असतं ! अर्थात त्या व्यक्तीच्या शब्दाला ते वजन प्राप्त होण्यासाठी, तुमच्या माझ्या सारख्या सामान्य लोकांनी, स्वतःच वजन खर्च करून त्यांना त्या पदावर बसवलेलं असतं, हे आपण नंतर विसरूनच जातो ! कारण आपलं एखाद सरकारी किंवा दुसरं कुठलंही काम मार्गी लावण्यासाठी, त्या स्वतः वजनदार असलेल्या नेत्याने आपल्या शब्दाचे वजन टाकून ते काम करावं, असं आपलं स्वतःच तोळामासा वजन त्याच्यावर खर्च करून त्याला विनवणी करायची पाळी नंतर आपल्यावरच येते ! असा माझ्या सारखा अनुभव आपण पण घेतला असेल, हे मी आपल्यावर माझ्या शब्दांच कुठलंही वजन न टाकता, तुम्ही कबूल कराल !

मंडळी सध्याचा जमानाच वजनाचा आलाय त्याला कोण काय करणार ! म्हणजे असं बघा, आपलं एखाद काम होण्यासाठी कुणाचा कधी वजनदार शब्द कामी नाही आला, तर आपल्या अर्जावर काहीतरी वजन ठेवल्याशिवाय तो मंजूरच होतं नाही ! या बाबतीत अशा प्रसंगातून गेलेले काही वजनदार “पेपरवेटच” जास्त वजन, सॉरी प्रकाश टाकू शकतील !

माझ्या पिढीच्या लहानपणी जवळ जवळ प्रत्येक रेल्वे प्लॅटफॉर्मवर, एक किंवा दोन वजनं करायची मशीन्स असायची. त्या मशीनवर उभं राहून त्यात एक रुपयाचे एक नाणे टाकले, की आपलं वजन दाखवणार एक तिकीट त्या मधून बाहेर येत असे ! त्या तिकिटाची एक खासियत अशी होती की त्याच्या एका बाजूला वजन करणाऱ्या माणसाचं वजन आणि मागच्या बाजूला त्याच त्या दिवसाचं भविष्य एका ओळीत लिहिलेलं असायचं ! ह्या दोन्ही छापील गोष्टी कधीच बरोबर नसायच्या हा भाग निराळा ! हल्लीच्या काळातील जगभरातल्या कुठल्याही कसीनोत दिसणाऱ्या स्लॉट मशीनचा, ही वजनाची मशिन्स म्हणजे बाल्यावस्था म्हणायला काहीच हरकत नाही ! कारण दोन्ही मशिन्स लोकांना हातोहात फसवून फक्त पैसे गिळंकृत करण्यासाठी बनली आहेत, हे मोठेपणी उमगते ! पण तो पर्यंत आपले खिश्याचे वजन बऱ्या पैकी कमी झालेलं असतं !

आधुनिक सायन्स नुसार प्रत्येकाच्या उंचीच्या प्रमाणात त्याचे किंवा तिचे, किती वजन असावे याच एक कोष्टक ठरलेलं आहे ! पण कुणाचं शारीरिक वजन किती असावं, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, असं माझं वजनान हलकं फुलकं मत आहे ! माझ्या या हलक्या फुलक्या मताशी माझे काही वजनदार मित्र मैत्रिणी नक्कीच सहमत होतील, यात मला तिळमात्र (कारण तीळ सुद्धा वजनाने हलके फुलके असतात) शंका नाही ! कारण कसं असतं नां, शेवटच्या ‘महायात्रेचा’ प्रसंग वगळता, शेवटी प्रत्येकाला स्वतःच वजन स्वतःच आयुष्यभर स्वतःच्या दोन पायावर वहायचं असतं ! त्यामुळे दुसऱ्याच्या वजनाचा त्रास आपल्याला जाणवायच तसं काही कारण नाही म्हणा ! पण हां, एखादी व्यक्ती जर का चुकून माकून, काही कारणाने आपल्या अंगावर पडली आणि ती जर का आपल्या पेक्षा वजनाने भरभक्कम असेल तर ? तर फार तर फार काय होईल, आपली किती हाडं मोडायची शिल्लक राहील्येत, हे आपल्याला फक्त कुठला तरी चांगला ऑर्थोपेडीक डॉक्टरच त्याची वजनदार फी घेवून सांगू शकेल इतकंच !

सध्याची पिढी खूपच हेल्थ कॉनशस झाल्याच आपण बघतो आहोत ! वजन कमी करण्यासाठी निरनिराळी डाएटस करणं, जिम जॉईन करणं, असे प्रकार ही तरुणाईतली मंडळी आजकाल करत असते ! त्यातील किती टक्के तरुण, तरुणी आपल्या वजन कमी करण्याच्या ध्येयापर्यंत पोचतात हा मला एक न पेलवणारा वजनदार प्रश्न ! कारण कुठलीही गोष्ट साध्य करण्यासाठी त्यात सातत्य आणि चिकाटी लागते ! पण या मंडळींपैकी काही आरंभशूरांमुळे, निरनिराळ्या जिम चालवणाऱ्या लोकांना आणि डाएटीशीयन लोकांना जरा बरे दिवस येवून त्यांची आर्थिक वजनं वाढल्याचे सध्या ऐकून आहे ! या बाबतीत एक मजेदार गोष्ट मला आठवते.  एका माणसाजवळ एक गाईचे वासरू होते. त्या वासराचा  काही कारणाने एकदा एक पाय मोडतो. त्यामुळे त्या वासराला नीट चालता येईनासे होतं. म्हणून तो माणूस त्या वासराला नेहमी कुठंही उचलून घेऊन जात असे. काही महिन्यांनी त्या वासराची गाय होते, तरी तो माणूस तिला उचलूनच नेत असे ! आता असं बघा, जर का कोणी त्या माणसाला एकदम गाय उचलायला सांगितली असती, तर ते त्याला शक्य झालं नसतं ! पण रोजच्या सरावामुळे तो पुढील काळात रोज गाय उचलू शकला, एवढं मात्र खरं ! समझने वालोंको……..! असो !

नुकत्याच ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीने केलेल्या एका वैज्ञानिक संशोधना नुसार, मुंगी हा जगातला असा एकमेव कीटक आहे, जो वेळ पडल्यास स्वतःच्या वजनाच्या सुमारे ५० ते ५०० पट वजन उचलू शकतो, असं सिद्ध केले आहे ! बापरे, ऐकावे ते नवलंच म्हणायचं आणि आपलं शाब्दिक वजन सोडा, पण निदान शारीरिक वजन तरी आपल्या उंचीनुसार आधुनिक सायन्सच्या कोष्टकाच्या जवळ पास मेंटेन कसं ठेवता येईल, यासाठी प्रयत्न करायला काय हरकत आहे मंडळी ?

शेवटी, आपले सगळ्यांचे शाब्दिक वजन लोकांच्या कोणत्या ना कोणत्या चांगल्या कामासाठी, नेहमीच कामी येवू दे, अशी मी माझ्या पूर्ण सत्तर किलोच्या शारीरिक वजनाने त्या ईश्वराच्या चरणी दोन्ही हात जोडून प्रार्थना करतो !

शुभं भवतु !

 

ता. क. – सर्वार्थाने वजनदार व्यक्ती काही “लाख डॉलर्स” खर्च करून, स्वतःचे वजन एखाद्या पिसासारखेच आहे असं अनुभवण्यासाठी, नुकत्याच रिचर्ड ब्रॉनसन यांनी चालू केलेल्या वर्जिन गॅलेकटीक या कंपनी तर्फे अवकाशात भ्रमण करून, तसा फिल घेवू शकतात बरं का !

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ घर ☆ प्रस्तुती – सुश्री मानसी आपटे

? विविधा ? 

☆ घर ☆ प्रस्तुती – सुश्री मानसी आपटे ☆ 

राहत्या घराला चार-आठ दिवसांसाठी कुलूप लावून जाताना जरा जीवावरच येतं नं…!

एक हुरहूर वाटते बंद दाराकडे बघून.. निरोप देताना मग मनातल्या मनात आपणच घरात सांगतो, “येतो परत आठ दिवसांत तोवर सांभाळ रे बाबा”.. तेव्हा घरही उदासल्यासारखं भासतं!

मग कधी कधी आठ दिवसांनी परतण्याचा वायदा पाळायला जमत नाही.. आणखी चारेक दिवस जास्तीचे घेऊन आपण जेव्हा परततो आणि आपल्या घराच्या दरवाजा समोर उभे राहतो ना तेव्हाचा सुकून काही वेगळाच असतो..! पण बहुधा वाट पाहून घर जरा रुसलेलं असतं..!

दार उघडल्यानंतर घराचं हिरमुसलेपण जागोजागी जाणवतं.. जाताना बदललेले कपडे कुठल्याशा खुर्चीवर, बेडवर नाहीतर सोफ्यावर तसेच आळशासारखे गपचिप पडून असतात. तेव्हा गडबडीत विसळलेल्या कपबश्या तशाच ओट्यावर उपड्या निपचीत असतात … पोरांची वह्यापुस्तकं अन् खेळण्यांचा पसारा कोपऱ्यातल्या टेबलावर निवांत हातपाय पसरून बसलेला असतो.. कपाटाच्या आरश्यात स्वतः आरशालाही बघू वाटू नये असा एक धुळीचा बारीक थर चढलेला असतो..! रोजचीच फरशी डोळ्यांना अन् पायांना वेगळीच लागते, किचन मधली काही भांडी जाळीत मान टाकून बसलेली असतात.. फ्रीज उघडल्यावर त्यात उरल्या सुरल्या भाज्या, फळे, लोणची, तुपाचे डबे, विरजण दाटीवाटीने डोळे वटारून बघायला लागतात.. आपण गेल्यावर जागावाटपासाठी यांच्यातही युद्ध झालेलं असतं बहुतेक! त्याच हातापायीत कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो अन् दोनचार फळंही शहीद झालेली असतात..!! बेडरूमच्या दरवाजामागे निघताना खराखर विंचरलेल्या केसांची गुंतावळ लपून बसलेली असते… सिंक वॉशबेसिन बाथरूम बिचारे सुकून गेलेले असतात..वाट पाहून घराच्या छताचा जीव त्याला टांगलेल्या फॅन सारखाच टांगणीला लागलेला असतो …भरीस भर म्हणून प्रवासातून आणलेल्या बॅगा व सामान हॉलमध्येच अंग पसरून बसलेलं असतं… आता सांगा बरं, घर कसं रुसणार नाही!

रुसलेल्या रागावलेल्या घराला मग “ती” आवरायला घेते! मलूल झालेल्या तुळस, मोगरी, गुलाबाच्या रोपट्यांना न्हाऊ घातलं जातं, इतके दिवस अंधार पांघरून बसलेल्या खिडक्यांचे पडदे सर्रकन दूर होतात आणि श्वास कोंडलेल्या घराला ताज्या हवेच्या झुळुकीने हायसं वाटते..! दोन तीन तासांत सारं काही जाग्यावर पोहचतं ! ती भरभर तिच्या लाडक्या घराला पुन्हा “देखणं” करते.. गोंजारते.. त्याला त्याचं “घरपण” पुन्हा मिळवून देते.. घराच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवते ..त्या ओळखीच्या स्पर्शाने मग मरगळलेलं घरही विरघळतं अन् सुखावून खुदकन हसू लागतं..!

घराला स्पर्श कळतात???.. हो कळतात!! त्याला आपली माणसेही कळतात.. आपली सुखदुःखंही त्याला ठाऊक असतात .. आठवून पहा, काही आनंदाश्रू, काही हुंदके, दुःखाचे कढ कधीकधी फक्त घरच्या भिंतींनाच माहिती असतात.. !!

तर अशा आवरलेल्या घराला मग हातात चहाचा कप घेऊन थोडी दमलेली ती समाधानाने न्याहाळत दोन घटका बसते तेव्हा लाडात आलेल्या लेकरासारखं घर तिच्याकडे पाहत असतं.. तिलाही  मनात वाटतं, “कोणाची दृष्ट न लागो”…!

शेवटी “बाई” घराचीही “आई”च असते..!! हो नं! ?

प्रस्तुती – मानसी आपटे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भाषेचे वैविध्य ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार

? विविधा ? 

☆ भाषेचे वैविध्य ☆सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆ 

नुकतीच एक बातमी वाचनात आली. ‘ बेळगाव येथे मराठी भाषिक आणि कन्नड भाषिक यांच्यात वादावादी झाली’. हा प्रकार बेळगावात नवीन नाही. ‘ बेळगाव म्हणजे कानडी व मराठी वादाची पेटती भट्टी आहे ‘ असं पु. ल. नेहमी म्हणायचे. पण त्या बातमीमुळे भाषेविषयी काही लिहावे असे वाटले.

दर वीस मैलांवर भाषा बदलते असं म्हणतात. ही भाषा म्हणजे मूळ भाषा नसून ती बोलीभाषा असते. फरक बोलीभाषेत असतो.मूळ भाषा एकच असते. काही शब्द वेगळे असतात, काही ठिकाणी उच्चार, हेल यात फरक असतो. बेळगाव मधे मराठी भाषिक खूप आहेत.पण त्यांची मराठी आणि महाराष्ट्रात बोलली जाणारी मराठी यात खूपच अंतर आहे. बेळगावात बोलल्या जाणाऱ्या मराठीवर कन्नड भाषेचा खूप प्रभाव आहे.

मराठी भाषेमध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात बोलली जाते ती भाषा, त्यातले हेल, उच्चार वेगवेगळे जाणवतात. पुण्यामधे साधारणपणे शुद्ध मराठी पहिल्यापासूनच बोलली जाते. सातारा, कोल्हापूर भागात वेगळेच टोन ऐकू येतात.सोलापूरची बोलीभाषा तर खूपच वेगळी आहे. त्यावर कन्नड आणि तेलुगू दोन्ही भाषांची छाप आहे.

शहरात आणि खेडेगावात तीच मराठी भाषा किती वेगळी वाटते. खेडेगावात तर असे काही शब्द वापरले जातात ते शहरातील लोकांना माहीतही नसतात. धुळे, नाशिक इथली बोली औरंगाबाद, किंवा एकूणच मराठवाड्यातील बोलीभाषा यात खूपच फरक आहे. खानदेशच्या भाषेवर तिथल्या स्थानिक अहिराणी भाषेचा जास्त प्रभाव आहे. ही अहिराणी भाषा गुजराती व मराठी यांचे मिश्रण आहे असे म्हणतात.विदर्भातल्या मराठी भाषेचा वेगळाच बाज आहे. मुंबईत हल्ली जी मराठी बोलतात तिच्यात निम्मे हिंदी , इंग्रजी शब्द घुसडलेले ऐकू येतात. शुद्ध पुणेरी मराठी असा लौकिक आजवर मिरवणाऱ्या पुण्यातल्या मराठी भाषेतही अलिकडे हिंदी इंग्रजी  प्रचुर शब्द येतात.

काळानुसार तर भाषेत फारच बदल होतात. प्रत्येक संतांच्या काळात जी जी बोली भाषा होती तीच त्यांच्या साहित्यातून प्रतीत झाली आहे.

एका राज्यातून दुसऱ्या राज्यात खूप जण स्थलांतरित होतात. त्यांची भाषा कालांतराने बरीच बदलते.तिथल्या भाषेचे संस्कार या भाषेवर होतात. त्यांच्या भाषेच्या टोनमधे आपली मूळ भाषा बोलली जाते. तिकडून पुन्हा ते जेव्हा मूळ स्थानी येतात तेव्हा हा वेगळेपणा जास्त जाणवतो.एखादे मराठी कुटुंब काही कारणाने बरीच वर्षे मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश इकडे राहिले तर ते परत महाराष्ट्रात येतात ते तिकडच्या भाषेचे मिश्रण घेऊनच!! ही स्वाभाविक होणारी प्रक्रिया आहे.

आम्ही काशी, गया, प्रयाग , अयोध्या यात्रेला गेलो होतो. काही मराठी पुरोहित वर्षानुवर्षे तिथे राहतात. ते मराठी बोलतात. पण ते अस्खलित मराठी वाटत नाही.तर त्यांच्या बोलण्यात हिंदीचा प्रभाव आहे. त्यात चूक काहीच नाही. एके ठिकाणचे गुरूजी आमच्याशी मराठी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत हे लक्षात येत होते. ते पिढ्यानपिढ्या तिकडे राहतात. त्यातही ते मराठी भाषा विसरलेले नाहीत ही खूप मोठी जमेची बाजू आहे. हे त्यांचेच श्रेय आहे.

परवा एका टीव्ही चॅनल विषयी काही वाचनात आले.ते आहे तामिळनाडूचे! नाव आहे ” दक्षिणी मराठी” . त्या चॅनल वर ते माहिती देतात की, १६७४ साली छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजी राजे भोसले यांनी अळगिरी नायक या राजाकडून तंजावर जिंकून घेतले.  साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी राजांनी  अनेक मराठी सरदार, त्यांची घराणी तंजावर येथे नेली.  हे लोक तिथेच स्थायिक झाले. ते मराठीच बोलत असत. पण काही काळानंतर त्या मराठीवर तिथल्या स्थानिक भाषेचा, संस्कृत भाषेचा शिवाय दक्षिण भारतातील  मल्याळम, तेलगू, कन्नड, तमिळ या सर्व भाषांचा प्रभाव पडत गेला. ती तंजावर मराठी  या नावाने प्रसिद्ध झाली.  तीच त्यांची बोली भाषा बनली.

हे लोक अजूनही गुढीपाडवा, संक्रांतीला तिळगूळ घ्या गोड बोला,  अंबाबाईचा गोंधळ हे सण मराठी पद्धतीने साजरे करतात म्हणे! ही गोष्ट ते अभिमानाने सांगतात. नोकरीनिमित्त किंवा इतर कोणत्याही कारणाने आता बरेच लोक महाराष्ट्र, गुजरात, उत्तरेकडची राज्ये ,दिल्ली दक्षिणेत इतरत्र, एवढेंच काय पण परदेशातही स्थायिक झाले आहेत. त्यामुळे तामिळनाडू येथे या लोकांची संख्या कमी झाली आहे. पण ते तंजावर मराठीच बोलतात. ही मराठीची वैशिष्ट्यपूर्ण बोली आहे.. या दक्षिणी मराठी चॅनेल च्या माध्यमातून त्यांचा आपल्या मूळ मातीशी संबंध टिकविण्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो. अनेक मराठी लोक आमचे चॅनल पाहतात. तुम्ही आम्ही एकच आहोत हे सांगायलाही ते विसरत नाहीत.

भारतात, किंबहुना जगातही अशा काही मराठीपासून उत्पन्न झालेल्या भाषा असतीलच. त्यांच्या विषयी समजले तर अजूनच आपल्या ज्ञानात भर पडेल.

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

पुणे 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मॅटिनीचे दिवस ☆ श्री प्रकाश लावंड

?  विविधा ?

☆ मॅटिनीचे दिवस ☆ श्री प्रकाश लावंड ☆

मॅटिनीला लागलेले  चित्रपट बघणे, हा त्या काळात एक अत्यंत जिव्हाळ्याचा भाग होता. त्यात एक कैफ असायचा. तो आम्ही पुरेपूर अनुभवला. त्याचे पडसाद आणि आठवणी, वयाच्या साठीतही निश्चित उर्जा  देणाऱ्या आहेत.

साधारण ४०-५० वर्षांपूर्वीचा हा कैफ आज आठवताना एक जाणवते की, केवळ चित्रपट, नट नट्या इतकेच मर्यादित नव्हते. ते तर असायचेच; पण त्याही सोबत इतर अनेक गोष्टी होत्या. आज मॅटिनीचा काळ इतिहास जमा झाला आहे. पण गोठवलेले ते क्षण  अजूनही ताजे आहेत.

तसे कुणाचेही चित्रपट चालत; पण खरा सम्राट होता देव आनंद. शिवाय  राज कपूर, दिलीप कुमार, राजेंद्र कुमारही अनेकदा भेटत,,,शम्मी कपूर हा तर एक्का होता. सी.आय.डी, नौ दो ग्यारह, उजाला, तुमसा नही देखा, हमराही, ससुराल इत्यादी अनेक चित्रपट मॅटिनीला पाहिले.

त्या स्वप्नभारल्या शाली अंगावर घेऊन दिवस फुलपाखरासारखा  जायचा. हा तो मॅटिनीचा काळ!

हा सगळा काळ भन्नाट गाण्यांचा होता. भगवान दादांचा ‘अलबेला ‘ देव आनंद चा’ असली नकली’ राजकपूरचा ‘श्री420’ दिलीप कुमार चा ‘कोहिनूर ‘ या चित्रपटांच्या गाण्यांवर पडद्यावर  पैसे उधळले जात. प्रेक्षक पडद्यासमोर डान्स करीत, एक “”बघणेबल सीन” असायचा.

मुळात थिएटर मधील चित्रपट ही संस्कृतीच आता संपली आहे. प्रेक्षकांचा सहभाग, दाद देण्याची पद्धत हे जवळपास नाहीच.इंटरव्हल झाल्यावर येणारा थंड पेयांच्या बाटल्यावर ओपनर फिरवल्यावर येणारा आवाज आता नाही, गरम शेंगांचे कोन नाहीत. इंटरव्हल संपल्यावर वाजणारी घंटा,,, आतला मायावी काळोख, पडदा सरकल्यावर येणारा आवाज, सगळे अजून कानात साठवलेले आहेत. हा कैफ मल्टीप्लेक्स मध्ये नाही, का नाही सांगता येत नाही. मॅटिनीचं एक वेगळेपण होतं, अगदी  प्रांजळपणे सांगायचं तर चित्रपट साक्षरता वगैरे प्रकार त्याकाळी नव्हते. होते फक्त “एक वेडेपण”,,

आज सगळे बदलले आहे, टीव्ही, मोबाईल वर चित्रपट आहेत. एकपडदा थिएटर जाऊन मल्टीप्लेक्स आले, आणखी एक संस्था संपली,, काळाबाजारवाले हा देखील एक  अविभाज्य  भाग होता. या सगळ्या संस्कृतीचा!! खरं तर मॅटिनीला काळाबाजार नसायचा. त्यामुळे सिनेमा  बजेट मध्ये साजरा व्हायचा ;;

डोअरकीपर इतका स्थितप्रज्ञ माणूस सापडणे अवघड. उशीरा येणाऱ्या प्रेक्षकांना बॅटरीचा प्रकाश पाडून सीट दाखवली जायची. आपल्या सीटचा  वेध घेत  बसल्यावर उशीरा आलेल्या प्रेक्षकाचा एक प्रश्न ठरलेला, “‘किती वेळ झाला सुरू होऊन?”” या प्रश्नाला काही अर्थ नसायचा. शेजारचे उत्तर देखील तेच असायचे “”आत्ताच  टायटल संपली”” या सगळ्या उपाशी पोटीचे (अनेक वेळा ) हे आख्यान म्हणजे “मॅटिनी”.   

सिनेमाच्या आठवणी अनेकरंगी आहेत, मॅटिनी त्यातील एक छटा, केवळ माझ्याच नव्हे तर अनेक रसिकांच्या आणि  विविध  गावांच्या छटा आहेत. उद्या सिनेमा चा इतिहास लिहिला तर “मॅटिनीचा ” उल्लेख  नक्की असेल.

© श्री प्रकाश लावंड

करमाळा जि.सोलापूर.

मोबा 9021497977

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वारसा….राधा ओक… ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ वारसा….राधा ओक… ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

काल सासूबाईंचे ८३ वर्षाचे भाऊ आले होते. त्यांच्याकडे बघून कोणी त्यांच्या वयाचा अंदाज बांधून दाखवावा. तरतरीत चेहरा, दात घट्ट, ऐकायला छान येतंय, हातात काठी नाही, डोळ्याला चष्मा नाही. वयपरत्वे किरकोळ तब्येतीच्या तक्रारी सोडता तरुणांना लाजवेल असा उत्साह. मध्यंतरी मी एका पुस्तकासाठी लेखन केलं होत. त्या पुस्तकाचं प्रकाशन करणाऱ्या लेखिका स्वतः पुस्तक द्यायला आल्या होत्या. वय वर्ष ८०+. तरीही आवाज खणखणीत, डोळे उत्तम, सरळ बांधा. फार दूर कशाला माझ्याच घरात माझ्या सासूबाई ७४ वर्षांच्या.  पण आजही  या वयात माझ्या दुप्पट काम करतात. या सर्वांची उदाहरणे द्यायचा एकच उद्देश म्हणजे मागच्या पिढीला मिळालेलं उत्तम आरोग्य म्हणजे देणगीच नाही का? आणि इथूनच मला माझ्या नवा लेखाचा विषय मिळाला तो म्हणजे वारसा. 

आज आपल्या पैकी ७०% घरांमध्ये सकाळी नाष्ट्यापासून संध्याकाळच्या स्वयंपाकापर्यंत घरात प्रत्येक कामाला बाई असतेच. नाश्ता, स्वयंपाक, केर, फरशी, भांडी. या प्रत्येक कामासाठी बहुतेक घरांमध्ये कामाची बाई लावलेली दिसते. या मुख्य कामांच्या यादीमध्ये भाजी आणणे, निवडणे, चिरणे, कपड्यांच्या घड्या घालणे, घर आवरणे, बेसिन बाथरूम टॉयलेट घासणे, या सारखी अनेक छोटी कामं लपलेली असतात. घरात बाई लावण्यामागे प्रत्येकाच्या वेगळ्या गरजा किंवा कारणे  असू शकतात.  त्याबद्दल मी काहीच बोलणार नाहीये. पण घरातली ही सगळी कामं आपल्या हातावेगळी होऊन पण आपल्याला असे कुठले शारीरिक कष्ट पडतात, की ज्यामुळे चाळीशी पन्नाशीमध्ये गुडघे, सांधे दुखणे असे हाडाचे दुखणे किंवा शरीराच्या इतर असंख्य  व्याधी निर्माण होतात? 

एखादा दिवस बाई नाही येणार म्हटलं की आपल्याला अगदी जीवावर येतं. मग बिनधास्त त्या दिवशी आपण बाहेरून ऑर्डर करतो, किंवा मग भांडी तशीच ठेऊन देतो. पण त्यापैकी एखादे  काम आपण करावे  असं का नाही वाटत? याचं  कारण कामाची कमी होत चाललेली सवय. आज फूड प्रोसेसर, व्हेजिटेबल कटर यामुळे हाताने कणिक भिजवताना किंवा भाजी निवडताना- चिरताना होणारे बोटाचे व्यायाम होतच नाहीत. घरात केर फरशीला बहुतेक घरामध्ये बाई असते.  त्या मुळे वाकून केर काढणे किंवा बसून फरशी पुसणे हा व्यायाम होतच नाही. घरातील अशी असंख्य कामं असतात ज्यामध्ये आपल्या शरीराला उत्तम व्यायाम मिळतो. आणि हेच कारण आहे ज्यामुळे आपल्याला चाळिशीतच शरीराच्या अनेक व्याधी निर्माण होतात. कारण शरीराला काही हालचाल किंवा ताण नाहीच. दुर्दैवाने असे व्यायाम आपल्यापैकी अनेकांच्या स्टेटसमध्ये बसत नाहीत किंवा स्वतःला करायचे नसतात. किंबहुना so called वेळच नाही मिळत, या सबबीखाली ढकलले जातात. पण मग ऑफिसच्या आधी किंवा नंतर  जिम, योग क्लास इथे  व्यायाम करायला वेळ असतो. 

वारसा म्हणजे  फक्त संपत्तीवरचा हक्क, जमीन जुमला, याचा नाही बरं का. तो वारसा आहे उत्तम  आरोग्याचा, निरोगी शरीर आणि मनाचा. मागच्या पिढीत पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचं आरोग्य जास्त चांगलं दिसत. का असेल बर असं? आज आपल्यापैकी ९०% स्त्रियांना ३५-४०शी मधेच तब्बेतीच्या असंख्य तक्रारी आहेत. पण याची खरी कारण आपण समजून किंवा जाणून घेतोय का? पूर्वी घरातली असंख्य काम घरातील बाई दिवसभर करत राहायची. त्यापैकी सगळ्याच स्त्रिया house wife नसायच्या. पण आपली नोकरी, व्यवसाय सांभाळून घरातील काम, सणवार यांचं management त्या जबरदस्त करायच्या. कारण मुळात त्यांच्याकडे स्वतःच्या घरासाठी काटकसरीनं जगायची आणि कष्ट करायची तयारी असायची. तिला आजूबाजूला बघायला देखील वेळ व्हायचा नाही. त्या बायकांना तासतासभर फोनवर बोलायला किंवा इतरांची उणीदुणी काढायला वेळ नसायचा. पण आपल्या पिढीमध्ये आपण “मला वेळच नाही ग मिळत” हे जे म्हणतो ना, त्याच्या खरं तर उलट, आपल्या कडे वेळच वेळ आहे. म्हणूनच कदाचित आपल्या पिढीमध्ये हेवेदावे, ego issues जास्त आहेत. कारण आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक माणसाचा विचार करत बसण्याइतका वेळ आहे. 

आपण पुढच्या पिढीला काय देतोय? एक कृत्रिम आयुष्य जे फक्त तंत्रज्ञांच्या भोवती फिरतंय. आपल्या मुलांना स्वतःच्या गोष्टी जागेवर ठेवणे, स्वतःच्या कपड्यांच्या घड्या घालणे, कपाट आवरणे, जेवलेलं स्वतःचं  ताट उचलून ठेवणे, अशी छोटी कामं देखील करून देत नाही. कारण त्यांच्या बघण्यात ही कामं  दुसराच कोणी तरी करतोय ज्याला पैसे दिले की आपलं काम झालं ही  भावना आपणच त्यांच्यात निर्माण करतोय, असं नाही का वाटत? आपल्या मुलांच्यात कष्टाची तयारीच निर्माण होत नाहीये. सगळं आयतं हातात मिळतं आहे. कॉलेजला जायला लागलं की   हातात गाडी मिळते,  पण मग कधी तरी चालत जायची वेळ आलीच  तर अशा वेळी मुलं कॉलेज बंक करून घरी बसतात. का? कारण कष्ट करायची तयारी नाही. 

आज आपल्याला एक किंवा फार फार तर दोन मुलं असतात. त्यामुळे त्यांना सगळं चांगलं द्यायच्या नादात आणि अति प्रोटेक्टिव्ह स्वभावामुळे आपण त्यांना अजून जास्त दुबळे बनवत आहोत. मध्यंतरी माझी एक मैत्रीण म्हणाली,  “ बर ग बाई तुला दोन मुलं आहेत. आम्हाला एकच आहे तेच जीवापाड जपायचं आहे. आमची राजकन्या आहे ती.”  प्रश्न मला दोन मुलं आहेत किंवा एक  मूल  याचा नाहीये. पूर्वीच्या काळी बायकांना ८-१० मुलं असायची.  पण म्हणून त्या त्यातल्या ८ मुलांना वाऱ्यावर नाही सोडायच्या. तसंच मला दोन मुलं आहेत म्हणजे मी एकाच्या बाबतीत प्रोटेक्टिव्ह आणि दुसऱ्याच्या  बाबतीत हवालदिल नाहीये. मुळात प्रश्न हा आहे की, मूल एक असो किंवा दोन, त्याला समाजात लढायची , कष्ट करायची , एखादी गोष्ट मिळवण्यासाठीचा ध्यास घेण्याची वृत्ती आपण निर्माण करतोय का नाही ? 

हा लेख म्हणजे मी काही ब्रह्मज्ञान देत नाहीये. किंबहुना मी देखील तुमच्या सगळ्यांच्यासारखीच आहे. पण स्वतःचं काही चुकत असेल तर मान्य करायची माझी तयारी आहे. तंत्रज्ञानाने माणसाला जितकं जवळ आणलं, मॉडर्न बनवलं, तितकंच पांगळही केलं. पूर्वी ६०ला सिनियर सिटीझन म्हटलं  जायचं. पण हे जर असंच सुरु राहिलं तर कदाचित येत्या काही वर्षात ४०लाच सिनियर सिटीझन म्हटलं जाईल. कारण जे म्हातारपण पूर्वी ६० नंतर यायचं, ते अलिकडे सरकत आत्ताच ४०ला येऊन पोचलंय. म्हणूनच वाटतं की आपल्या पुढच्या पिढीला संपत्ती, पैसे याचा वारसा देण्यापेक्षा, उत्तम आरोग्यासाठी कानमंत्र देऊया, जो त्यांचं आयुष्य अजून सुंदर करायला मदत करेल.

लेखिका :-  राधा ओक

संग्राहक :- डॉ. ज्योती गोडबोले 

 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ निवृत्ती… ☆ श्री शरद दिवेकर

?  विविधा ?

☆ निवृत्ती… ☆ श्री शरद दिवेकर ☆

सृष्टीमध्ये प्रारंभ आणि अंत हे चक्र सदैव सुरूच असतं. एखाद्या रोपट्याचंच उदाहरण घेऊया. पहिला कोंब फुटतो आणि प्रारंभ होतो रोपट्याचा. तो कोंब उमलतो, ज्याला आपण पान असं म्हणतो. अगदी हिरवंकंच असतं ते. कालपरत्वे उत्कर्षबिंदूनंतर हळूहळू पानाचा रंग बदलायला लागतो आणि नंतर ते पान सुकायला लागतं आणि एके दिवशी ते पान गळून पडतं. पानाचा रंग बदलायला सुरूवात होणे आणि ते सुकायला लागणे ही झाली निवृत्ती.

माणसाचं देखील असंच  असतं. पण माणसाच्या आयुष्यात एकदाच येते का हो ही निवृत्ती ? नाही. माणूस अनेक वेळा निवृत्त होत असतो. नव्हे, त्याने प्रत्येक वेळी, प्रत्येक फेजमध्ये निवृत्ती घ्यायलाच हवी. एका फेजमधून निवृत्ती घेऊन  पुढच्या फेजमध्ये पाऊल टाकायला हवं. असं करताना त्या त्या फेजमध्ये निर्माण झालेले अनुबंध तोडण्याची काहीच आवश्यकता नाही. खरं तर अनुबंध तोडण्यासाठी नसतातच. पण माणसाने एका फेजमध्ये गुंतून राहूच  नये.

माणसाच्या अनेक निवृत्तींपैकी पहिली निवृत्ती म्हणता येईल ती  म्हणजे शालेय शिक्षण संपताना घ्यावी लागणारी निवृत्ती. हे वयच तसं असतं. आता सगळेच मित्र मैत्रिणी पांगणार असतात. इतकी वर्षे केलेला एकत्र अभ्यास, एकत्र खाल्लेला टिफिन, खेळ आणि मारामारी देखील. खुपच हळुवार आठवणी असतात आणि हुरहुर लावणारे क्षण. पण या निवृत्तीला पर्याय नसतो.

दुसरी निवृत्ती येते ती काॅलेजचं शिक्षण संपताना. पण शाळा सोडताना वाटणारी हुरहुर तेवढ्या प्रमाणात यावेळी नसते. एक चांगली बाजू असते हल्ली की काॅलेज सोडल्यावर देखील आपण सोशल मिडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात राहू शकतो. त्यामुळे ही निवृत्ती तेवढी क्लेशदायक नसते.

त्यानंतर माणूस नोकरी व्यवसायात शिरला की घाण्याला जुंपलेल्या बैलासारखा नुसता धावत असतो, अखंड. करिअर, पैसा, सेव्हिंग्ज, आपल्या स्वप्नातील घर, मनासारखा जोडीदार आणि नंतर मुलं बाळं. त्यानंतर पाल्यांचं पालनपोषण, शिक्षण, वगैरे. कधीही न संपणारी यादी असते ही.

मुलं मुली मोठे झाले की त्यांना शिंगं फुटायला लागतात. त्यावेळी मित्रत्वाच्या भूमिकेत शिरून त्यांना सल्ला द्यावा, चांगलं वाईट काय ते समजावून सांगावं. आपल्या संस्कारांमुळे त्यांना आपलं बरंचसं पटतं. पण कधी कधी जनरेशन गॅपमुळे काही मतभिन्नता होऊ शकते. त्यावेळी त्यांच्यापासून त्या वेळेपुरती निवृत्ती घ्यावी. दुरून लक्ष ठेवावं हे ओघाने आलंच.

मुलामुलीच्या लग्नाच्या वेळेच्या आसपास आपली सेवानिवृत्ती जवळ आलेली असतेच. त्यावेळी मुलामुलीला त्यांच्या स्वतःच्या पायांवर उभं रहायला द्यावं. फार काही ढवळाढवळ करू नये त्यांच्या आयुष्यात. त्यांच्यापासून निवृत्ती घ्यावी.

मुलगा मुलगी परदेशात गेले असतील तर आपल्या व त्यांच्यात कदाचित जास्त अंतर पडू शकतं. त्याची मानसिक तयारी ठेवावी.

आयुष्यात असेही प्रसंग येतात की एखाद्याने तुम्हाला त्याच्यासाठी काहीतरी करायला सांगितलेले असते आणि ते काम तुम्ही सहजरीत्या करून जाता. या कामाबद्दल तुम्हाला काही मोबदला मिळणार नसतो. तुमची तशी अपेक्षा देखील नसते. पण कौतुकाच्या दोन शब्दांची अपेक्षा मात्र असु शकते. पण खरं तर तशी अपेक्षा ठेवू नये. कारण अपेक्षापुर्ती झाली नाही तर आपल्यालाच मानसिक त्रास होतो. म्हणूनच ते काम करून मोकळं व्हावं व लगेचच त्यातून निवृत्ती घ्यावी.

एक निवृत्ती अशी देखील असावी ज्याची अनुभुती फक्त स्त्रीयाच घेऊ शकतात. पुरूष घेऊ शकत नाहीत. ती म्हणजे एकदा घरात सुन आली की सासुने मार्गदर्शकाच्या भूमिकेत शिरावं आणि सुनेचे नव्या नवलाईचे दिवस संपले की किचनचा ताबा हळूहळू सुनेकडे द्यावा. चार उपदेशाच्या गोष्टी जरूर सांगाव्यात. पण तिला मोकळीक द्यावी. तसेच तिच्याकडूनही काही नवं शिकावं, अपडेट रहाण्यासाठी.

यानंतर सर्वांच्याच आयुष्यात एकदाच येणारी निवृत्ती म्हणजे सेवानिवृत्ती. तो दिवस फारच हळवा असतो. उद्यापासून एकदम रिकामपण येणार असतं. एक मोठी पोकळी निर्माण होणार असते. काहीजण हे सगळं ग्रेसफुली घेतात आणि सहज निवृत्त होतात. पण ब-याच जणांना ते जमत नाही आणि तिथेच चुकतं त्यांचं. आता खरं तर सेकंड इनिंग सुरू करायची असते. त्या सेकंड इनिंगची तयारी अगोदरच केलेली असेल तर ती देखील एंजॉय करता येते. खुप सोपं असतं ते. आपण रोज कसं कसं आणि काय काय करायचं ते ठरवायचं आणि व्यवस्थित पार पाडायचं म्हणजे झालं. काय करता येत नाही या इनिंगमध्ये ? माॅर्निंग वाॅक, इव्हिनिंग वाॅक, व्यायाम, व्यवस्थित झोप, नाश्ता, जेवण, वगैरे. त्याच्या जोडीला वाचन, चिंतन, मनन आणि लेखनाचं अंग असल्यास उत्तमच. हल्ली तर WhatsApp,  Facebook, Blogs, इत्यादी प्लॅटफॉर्म्स उपलब्ध असतात. संगीताची आवड असेल तर दुधामध्ये केशरच. तसेच निसर्गात भटकावं, ज्या ठिकाणी जायचं राहीलं असेल तेथे जोडीदारासह जाऊन यावं, करायच्या  राहून गेलेल्या गोष्टी करून टाकाव्यात.

या सगळ्यात एका निवृत्तीबद्दल सांगायचंच राहिलं. रोज रात्री झोपताना सर्वांतून काही तासांसाठी सक्तीची निवृत्ती घ्यावी. म्हणजे शांत झोप लागते व दुस-या दिवशी सकाळी आपण एकदम फ्रेश असतो त्या दिवसाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी. कारण नवीन दिवस म्हणजे नवीन जन्मच असतो आपला.

EVERY DAY IS A MINIATURE OF LIFE FOR BIG DREAMS.

या सर्व ब-याचशा सहजसाध्य निवृत्तींनंतर अगदी अखेरचीच निवृत्ती सहज घेता येईल का माणसाला ?

 

©  श्री शरद दिवेकर

कल्याण

मो 70457 30570 

ईमेल – [email protected]

 

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! ☆ टेक्निक ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? टेक्निक ! ??

“अगं ऐकलंस का, एक फक्कडसा चहा आण बघू, खूप दमलोय !”

“एवढ दमायला काय झालंय तुम्हांला ? चाळीतल्या पोरांनी ख्रिसमससाठी बनवलेलं ख्रिसमस ट्री  चढून एकदम घरात नाही नां आलात ?”

“काहीतरीच काय तुझं ? मला अजून पायाखालच नीट दिसतंय ! तुझ्या सारख्या त्या टीव्हीवरच्या रटाळ सिरीयल बघून, मला चष्मा नाही लागलाय अजून !”

“कळलं कळलं ! आता दमायला काय झालंय ते सांगा ?”

“अगं हे काय आणलंय ते बघ तरी !”

“अ s s ग्गो बाई ! डिनर सेट !”

“करेक्ट, अगं आपल्याला लग्नात मिळालेला डिनर सेट आता किती जुना झालाय ! म्हटलं घेऊन टाकू एक नवीन !”

“हो, पण त्यात एवढं दमायला काय झालंय म्हणते मी ?”

“अगं तो बॉक्स जरा उचलून तर बघ ! सेव्हन्टी टू पिसेसचा अनब्रेकेबल डिनर सेट आहे म्हटलं ! एवढा जड डिनर सेट दोन जिने चढून आणल्यावर दम नाही का लागणार ?”

“अगं बाई, खरच जड आहे हो हा !”

“आता पटली खात्री, मी का दमलोय त्याची ! मग आता तरी आणशील ना चहा ?”

“एकच मिनिटं हं !”

“आता का s य s ?”

“अहो, या बॉक्सवर Hilton कंपनीच नांव आहे !”

“बरोबर, म्हणजे तुला इंग्लिश वाचता येतं तर !”

“उगाच फालतू जोक्स नकोयत मला !”

“यात कसला जोक? तू नांव बरोब्बर वाचलंस म्हणून……”

“तुम्हांला ना, खरेदीतल काही म्हणजे काही कळत नाही !”

“आता यात न कळण्यासारखं काय आहे ? हा डिनर सेट नाही तर काय लेमन सेट आहे ?”

“तसं नाही, अहो Milton कंपनी डिनर सेट बनवण्यात प्रसिद्ध आहे आणि तुम्ही आणलात Hilton चा डिनर सेट, कळलं ! कुठून आणलात हा सेट ?”

“अगं तुझ्या नेहमीच्या ‘महावीर स्टोर्स’ मधून ! तो मालक मला म्हणाला पण, काय शेट आज भाभीजी नाय काय आल्या तुमच्या संगाती ! मी म्हटलं शेठ, तुमच्या भाभीजीला सरप्राईज देणार आहे आज, म्हणून तिला नाही आणलं बरोबर !”

“आणि पायावर धोंडा मारून घेतला !”

“आता यात कसला पायावर धोंडा ?”

“अहो Milton च्या ऐवजी Hilton चा डिनर सेट आणलात नां ?”

“अगं तो शेठच म्हणाला, ही Hilton कंपनी नवीन आहे, पण चांगले डिनर सेट बनवते आणि Milton पेक्षा खूपच स्वस्त, म्हणून….”

“स्व s s स्त s s ! एरवी मी दुकानात घासाघिस करतांना मला अडवता आणि आज स्वतःच डुप्लिकेट माल घेऊन आलात ना ?”

“यात कसला डुप्लिकेट माल ? हे बघ या बॉक्सवर चक्क लिहलय, Export Quality, Made in USA !”

“अहो, USA म्हणजे उल्हासनगर सिंधी अससोसिएशन पण होऊ शकत ना ? मला सांगा, हा डिनर सेट अनब्रेकेबल आहे कशावरून ?”

“अग असं काय करतेस ? शेटजीनी मला एक सूप बाउल आणि एक डिश खाली जमिनीवर आपटून पण दाखवली !”

“मग ?”

“मग काय मग, ते दोन्ही फुटले नाहीत, म्हणजे तो सेट अनब्रेकेबल नाही का ?”

“फक्त दोनच आयटम जमिनीवर टेस्ट केले ? सगळा डिनर सेट नाही ?”

“काय गं, तुम्ही बायका भात तयार झालाय की नाही हे बघायला, फक्त त्यातली एक दोनच शीत चेपून बघता ना ? का त्यासाठी अख्खा भात चिवडता ?”

“अहो भाताची गोष्ट वेगळी आणि डिनर सेटची गोष्ट वेगळी !”

“ठीक आहे, मग हा सूप बाउल घे आणि तूच बघ जमिनीवर टाकून.”

असं बोलून मी बायकोच्या हातात त्या सेट मधला सूप बाउल दिला ! तिने तो हातात घेऊन मला विचारलं

“नक्की नां ?”

“अगं बिनधास्त टाक, अनब्रेकेबल…”

माझं वाक्य पूरं व्हायच्या आत बायकोने तो सूप बाउल जमिनीवर टाकला आणि त्याचे एक दोन नाही तर चक्क चार तुकडे झाले मंडळी !

“आता बोला ? हा डिनर सेट अनब्रेकेबल आहे म्हणून !”

“अगं पण शेठजीने खरंच सूप बाउल खाली टाकला होता पण त्याला साधं खरचटलं पण नाही. शिवाय…..!”

“एक डिश पण नां ?”

असं बोलून तिने सेट मधली एक डिश घेतली आणि ती पण जमिनीवर टाकली. मंडळी काय सांगू तुम्हांला, ती डिश पण सूप बाउलच्या मागोमाग निजधामास गेली ! ते बघताच मी उसन अवसान आणून बायकोला म्हटलं, “अगं पण माझ्या समोर त्याने या दोन गोष्टी टाकल्या त्या कशा फुटल्या नाही म्हणतो मी ?”

“अहो हेच तर त्या व्यपाऱ्यांच टेक्निक असतं !”

“टेक्निक, कसलं टेक्निक ?”

“अहो त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात, हे तुम्हांला कधीच कळणार नाही !”

“म्हणजे ?”

“मला सांगा, त्या शेठने ज्या सेट मधल्या बाउल आणि डिश खाली टाकल्या तो सेट तुम्हांला दिला का ?”

“नाही नां, मला म्हणाला तो शोकेसचा पीस आहे, मी तुम्हांला पेटी पॅक सेट देतो !”

“आणि तुम्ही भोळे सांब त्याच्यावर विश्वास ठेवून पेटी पॅक सेट घेवून आलात, बरोबर नां ?”

“होय गं, पण मग आता काय करायच ?”

“आता तुम्ही नां, मेहेरबानी करून काहीच करू नका ! फक्त तो बॉक्स द्या माझ्याकडे, मी बघते काय करायच ते !”

“अगं पण….”

“आता पण नाही आणि बिण नाही, आता मी माझं टेक्निक दाखवते शेटजीला ! ही गेले आणि ही परत आले ! आणि हो, मी येई पर्यंत आपल्या दोघांसाठी चहा करा जरा फक्कडसा !”

असं बोलून बायकोने तो बॉक्स लिलया उचलला आणि ती घराबाहेर पडली ! मी आज्ञाधारक नवऱ्यासारखा चहा करायला किचन मधे गेलो ! माझा चहा तयार होतोय न होतोय, तेवढ्यात हिचा विजयी स्वर कानावर आला “हे घ्या !” असं म्हणत बायकोने Milton च्या डिनर सेटचा बॉक्स जवळ जवळ माझ्यासमोर आपटलाच !

“अगं हळू, किती जोरात टाकलास बॉक्स ! सेट फुटेल नां आतला !”

“आ s हा s हा s ! काय तर म्हणे सेट फुटेल ! अहो हा काय तुम्ही आणलेला डुप्लिकेट Hilton चा सेट थोडाच आहे फुटायला ?  ओरिजिनल Milton चा डिनर सेट आहे म्हटलं !”

“काय सांगतेस काय, Milton चा डिनर सेट ? अगं पण त्या शेटनं तो बदलून कसा काय दिला तुला ?”

“त्या साठी मी माझं टेक्निक वापरलं !”

“कसलं टेक्निक ?”

“लोणकढीच टेक्निक !”

“म्हणजे ?”

“अहो मी त्याला लोणकढी थाप मारली, की तू जर का मला हा Hilton चा सेट बदलून Milton चा सेट दिलास, तर मी आणखी पन्नास Milton चे सेट तुझ्याकडून घेईन !”

“काय आणखी पन्नास Milton चे डिनर सेट ? काय दुकान वगैरे….”

“अहो, मी त्याला सांगितलं पुढच्या महिन्यात माझ्या नणंदेच लग्न आहे. तेंव्हा पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून मला ते हवे आहेत !”

“अगं पण तुला मुळात नणंदच नाही तर तीच लग्न…..”

“अहो हेच ते माझं  लोणकढीच टेक्निक !”

“धन्य आहे तुझी !”

© श्री प्रमोद वामन वर्तक

२४-१२-२०२१

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रसिका तुझ्याचसाठी… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  विविधा ?

☆ रसिका तुझ्याचसाठी… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

आज २३ डिसेंबर— 

रसिका तुझ्याचसाठी मी एक गीत गाते —

हृदयात दाटलेली भावांजली वहाते —-”

आपल्या रसिक श्रोत्यांप्रती आणि रसिक वाचकांप्रती जणू कृतज्ञता व्यक्त करत, असे भावपूर्ण काव्य लिहिणारे श्री. गंगाधर महाम्बरे यांचा आज स्मृतिदिन.(३१/१/१९३१ – २३/१२/२००५) 

प्रतिभावंत कवी, गीतकार, लेखक, बालसाहित्यकार, आणि याच्या जोडीने, अनुवादक, ग्रंथपाल, कोशकार– असे चतुरस्त्र व्यक्तिमत्व लाभलेले श्री. महाम्बरे. ते कोकणातून पुण्यात आल्यावर पूर्ण वेळ साहित्यक्षेत्रात रममाण होण्याआधी, त्यांनी वृत्तपत्र व्यवसाय सुरु केला होता. आणि नंतर फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये बरीच वर्षे ग्रंथपाल म्हणूनही ते कार्यरत होते. 

अर्थात  ही त्यांची अगदी सुरुवातीची ओळख. खरी ओळख ” एक बहुरंगी बहुढंगी साहित्य-निर्माते ” हीच., 

 त्यांच्या साहित्यनिर्मितीतले वैविध्यही खरोखरच थक्क करणारे. त्यांनी अगदी वेगवेगळ्या विषयांवर पुस्तके लिहिली आहेत. ती अशी —-

१ ) साहित्यविश्वाला समृद्ध करणारे लेखन —
आनंदाचे डोही, मराठी गझल, उत्तुंगतेचा सह्जस्पर्श, उषःकाल ( कवितासंग्रह ), किशोरनामा –
 ( कथासंग्रह ), रंग जीवनाचे ( कादंबरी ), रसिकेषु ( ललितलेखन ), वॉल्ट डिस्ने चरित्र, व्यक्तिचित्रे, सैगल, चार्ली चॅप्लिन : काळ आणि आज, विस्मरणापलीकडील पु.ल., प्रतिभावंतांच्या सहवासात,
बिजलीचा टाळ ( कादंबरी ), भावगीतकार ज्ञानेश्वर, सापेक्षी समीक्षा, प्रवासातील प्रतिभावंत,
माणसं जनातील-मनातील, मौनांकित ( चरित्र ). त्यांनी नाटककार आणि बंगाली वाङ्मयाचे अभ्यासक असणाऱ्या मामा वरेरकर यांचे चरित्र ‘ एक अविस्मरणीय मामा ‘ नावाने लिहिले आहे. तसेच दादासाहेब फाळके यांचेही चरित्र त्यांनी लिहिलेले आहे.
 
२ ) अगदी वेगळ्या विषयांवरील पुस्तके —
कोकणातले व्यवसाय व त्यासंबंधीचे मार्गदर्शन, ऑटोरिक्षा ( देखभाल व दुरुस्ती ), महिलांसाठी उद्योगव्यवसाय, लाखमोलाचे उद्योगव्यवसाय, चला जाणून घेऊ या ! अंकशास्त्र. मौलिक मत्स्यव्यवसाय, मेडिकल ट्रान्सक्रिप्शन, मोडी शिका, भगवान गौतम बुद्ध आणि बौद्धधर्म, लघुउद्योगाची लक्ष्मणरेषा, महाराष्ट्रातील समाजसुधारक, विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक कल्पकता, विद्यार्थ्यांसाठी उद्योगव्यवसाय, शुभंकरोती, — आणि असे बरेच काही मार्गदर्शक लेखन. याखेरीज, २१ व्या शतकाचा मराठी-इंग्रजी शब्दकोश, आणि चित्रपट क्षेत्रातल्या तांत्रिक शब्दांचा कोशही त्यांनी तयार केला होता.

श्री. महाम्बरे यांच्या काव्यनिर्मितीतही– भावगीते, चित्रपट गीते, आणि नाट्यगीते, अशी विपुलता होती.—– कंठातच रुतल्या ताना, तू विसरुनी जा रे–, निळा सावळा नाथ, पाण्यातले पहाता प्रतिबिंब, पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव, बोलून प्रेमबोल तू लाविलास छंद, संधीकाळी या अशा, सावलीस का कळे, तूच खरा आधार- देवा, अशी कित्येक उत्कट भावकाव्ये त्यांनी लिहिलेली आहेत.

धाकटी मेहुणी, युगे युगे मी वाट पहिली, सोबती, सौभाग्यकांक्षिणी, अशा चित्रपटातली त्यांची गीते प्रसिद्ध झाली होती. तसेच, गा भैरवी गा, चाफा बोलेना, तेथे कर माझे जुळती, या नाटकांमधली गीते त्यांनी लिहिलेली होती.

त्यांना मिळालेले पुरस्कार —– “ मौलिक मराठी चित्रगीते “ या रसग्रहणात्मक पुस्तकाला ‘ राष्ट्रपती सुवर्णकमळ ‘ – नॅशनल प्रॉडक्टिव्हिटी काउन्सिल दिल्ली तर्फे १९८३ सालचा ‘ पोएट ऑफ दि इयर ‘ पुरस्कार, – चित्रपट महामंडळाचा ‘ चित्ररत्न पुरस्कार’, – गोमंतक मराठी अकादमीची सन्माननीय फेलोशिप,– म.स.प.चा ना.घ.देशपांडे पुरस्कार ‘, –केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचे अनेक पुरस्कार. मॉरिशस नभोवाणीवर त्यांच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या होत्या, आणि ‘ रसिक तुझ्याचसाठी ‘ या गीताची ध्वनिमुद्रिका अमेरिकन कंपनीनेही प्रसिद्ध केली होती, या विशेष गोष्टी सांगितल्याच पाहिजेत अशा.

श्री. गंगाधर महाम्बरे यांना आजच्या स्मृतिदिनी भावपूर्ण श्रद्धांजली.

आज  “ कवितेचा उत्सव “ या सदरात वाचूया श्री. महाम्बरे यांची एक सुंदर काव्यरचना.

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares