मराठी साहित्य – विविधा ☆ शि ट्टी! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

⭐ शि ट्टी ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“एक…. दोन…. तीन…. चार….

चार…. तीन…. दोन…. एक….”

लहानपणी शाळेत शारीरिक शिक्षणाच्या तासाला, एक, दोन, तीन, चार या ऑर्डरवर आणि नंतर गुरुजींनी त्याच ठेक्यात वाजवलेल्या शिट्टीच्या तालावर, माझ्या पिढीतल्या अनेकांना कवायत केल्याचे आठवत असेल !  एवढ्या लहानपणी शिट्टीशी येणारा आपला (निदान माझा तरी) तो तसा पहिलाच प्रसंग असावा ! गुरुजींच्या गळ्यात, रंगीत दोऱ्यात अडकवलेल्या, स्टीलच्या चकचकित शिट्टीचा आवाज अजूनही माझ्या कानात घुमतो आहे ! त्या काळी, ती इतक्या जोरात कशी वाजते, ह्याचेच अप्रूप वाटायचे ! पण या शिट्टीच्या आवाजाचे वर्णन आपल्या मराठी साहित्यात, फु s s s र s s s, फु s s s र s s s  असे करण्याचा पहिला मानकरी किंवा पहिली मानकरीण (शिट्टी हा स्त्री लिंगी शब्द असल्यामुळे आणि तिचा स्त्रियांशी जवळचा संबंध येतो हे नंतर वयात आल्यावर कळल्यामुळे, ही शंका मनांत डोकावली, इतकंच !) कोण असावा अथवा असावी, हा माझ्या मते संशोधनाचा विषय होईल !कारण बशीतून चहा पितांना काही जणांच्या तोंडातून येणाऱ्या आवाजाचे वर्णन सुद्धा अनेक विद्वान लेखक, लेखिकांनी फु s s s र s s s, फु s s s र s s s असेच केल्याचे आढळते ! आपली मराठी भाषा एवढी समृद्ध असतांना, दोन टोकाच्या, दोन वेगवेगळ्या आवाजांसाठी एकाच प्रकारची शब्द रचना वाचतांना, माझ्या कानांत नेहमी वेगळीच शिट्टी वाजते, एव्हढं मात्र खरं ! असो !

पुढे शालेय जीवन संपता संपता, कॉलेज प्रवेशाच्या आधी माझे बरेचसे मित्र वेग वेगळ्या प्रकारच्या शिट्ट्या, तोंडाने वाजवण्यात पारंगत झाले होते ! त्याचा काही मित्रांना कॉलेजच्या उर्वरित वर्षात चांगलाच उपयोग झाला ! कारण त्यांनी घातलेल्या शिट्टीरुपी कुहू कुहूला, त्यांच्या त्यांच्या मैनांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे, भविष्यात त्या पैकी काहींची लग्ने आपापल्या मैनांशी झाली ! पुढे हेच यशस्वी कोकीळ संसारात पडल्यावर, आपापल्या मैनांचा “अहो, जरा चार शिट्ट्या झाल्यावर आठवणीने कुकर खालचा गॅस बंद करा !” असा आदेश ऐकायची सवय त्यांना करून घ्यावी लागली, हा भाग निराळा ! पण कॉलेजातील काही उर्वरित कमनशिबी कोकीळ, मैनांना भुलवण्याच्या नादात शिट्ट्या वाजवून, वाजवून आपापल्या तोंडाची नुसतीच वाफ फुकट घालवत राहिले ! काही वात्रट मित्रांच्या म्हणण्यानुसार, त्या सगळ्या मित्रांच्या फुकट गेलेल्या वाफेच्या एकत्रित शक्तीवर, माथेरानला जाणाऱ्या आगगाडीचे छोटे इंजिन नक्कीच धावले असते म्हणे !

इंजिनावरून आठवण झाली. ज्या काळात आम्ही आत्ताच्या “ट्रेनला” आगगाडी म्हणायचो, त्या अठरा वीस डब्याच्या अजगरा सारख्या लांबच लांब मेल किंवा एक्सप्रेसमधून प्रवास करायची बरेच वेळा त्या काळी वेळ आली ! तेंव्हा त्या गाडीचा गार्ड, गाडी सुटतांना जी शिट्टी फुकायचा ती इतकी कर्कश्य असायची की, फलाटावरच्या हजारो लोकांचा गोंगाट भेदून, वीस डबे सोडून असलेल्या इंजिन ड्रायव्हरला बरोब्बर ऐकू येत असे ! मग तो इंजिन ड्रायव्हर सुद्धा ऑल क्लिअरचा हिरवा झेंडा गार्डच्या दिशेला फडकावून, एक दोन दणदणीत इंजिनाच्या शिट्ट्या देवून आगगाडी सुरु करत असे ! गेले ते दिवस उरल्या त्या फक्त आठवणीतल्या अशा शिट्ट्या !

फार फार वर्षांपूर्वी, म्हणजे असं बघा जेंव्हा पोलीस त्यांच्या निळ्या टोपी पासून निळी हाफपॅन्ट अशा गणवेषात होते, तेंव्हा त्यांची ती स्टीलची लांबूडकी शिट्टी नुसती ऐकून चोर एका जागी थिजून जात असत ! एवढी ताकद त्या काळी फक्त त्यांच्या शिट्टीत होती ! पण सध्या गणवेशापासून सारेच ‘खिशाचे गणित’ बदलले असल्यामुळे त्या पूर्वीच्या शिट्टीला सध्याच्या युनिफॉर्ममधे खिसाच नाही, मग ती शिट्टी तरी कशी असेल ? कालाय तस्मै नमः !

एखाद्या कलाकाराची रंगमंचीय कला पिटातल्या प्रेक्षकाला आवडल्यावर, त्या कलाकाराला वन्समोअरसाठी वाजणाऱ्या टाळयांच्या जोडीला, वाजणाऱ्या शिट्यांची जातकुळी फार म्हणजे फारच वेगळी असते मंडळी ! त्या टाळ्या, शिट्या ऐकून एखादा कलाकार प्रेक्षकांची वन्समोअरची हौस पुरवतो सुद्धा, पण त्या साऱ्या गदारोळात खऱ्या रसिक प्रेक्षकांची फारच गोची होऊन जाते ! रंगमंचीय कला अविष्काराला अशी दाद मी एकवेळ समजू शकतो, पण चित्रपटगृहात हिरोच्या एखाद्या डायलॉगवर किंवा हिरोईनच्या नाचावर, तो आवडला म्हणून कानठळ्या बसण्या इतक्या शिट्ट्या वाजवायच प्रयोजन, माझ्या सारख्या रसिक प्रेक्षकाच्या बुद्धीच्या आकलना पलीकडलं आहे !

सांप्रतकाळी समस्त महिला वर्ग, पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात यशस्वीपणे बरोबरी करत असतांना, या शिट्टी वाजवायच्या पुरुषांच्या पूर्वी पासून मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात कशा बरे मागे राहतील ? उदाहरणच द्यायच झालं, तर काही भगिनी शिट्टीवर वेगवेगळी गाणी म्हणण्याचे दोन अडीच तासाचे स्वतंत्र कार्यक्रमच सध्या सादर करत आहेत, हे आपल्याला ठाऊक असेलच !

मंडळी, सध्या मी शिट्टीचा जनक कोण ?  याच बरोबर ती शिट्टी पहिल्यांदा कोणी कशी वाजवली व त्याच्या आवाजाचे त्या काळी कोणावर कसे चांगले अथवा वाईट परिणाम झाले या विषयी संशोधन करत आहे ! पुढे मागे ‘शिट्टी’ विषयावरच एखादा प्रबंध लिहून, तो उत्तर प्रदेश मधल्या एखाद्या युनिव्हर्सिटीत सादर करून, डॉक्टरेट पदरात पाडून घ्यायचा विचार माझ्या डोक्यात शिट्टी वाजवून गेलाय एवढं मात्र नक्की !

ता. क. – उत्तर प्रदेशातल्या अनेकांनी “शिट्टी!” याच विषयावर आधीच डॉक्टरेट मिळवल्याचे कळले ! पण मी आशा सोडली नसून, मध्य प्रदेशातील एखाद्या युनिव्हर्सिटीत मी माझी “शिट्टी!” वाजवायचीच, असा निर्धार केला असून, आपल्या “शिट्टी” रुपी शुभेच्छांची या कामी मला नक्कीच मदत होईल !

© श्री प्रमोद वामन वर्तक

३०-११-२०२१

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गरज क्रांतीकारकांची… ☆ प्रा. तुकाराम पाटील

श्री तुकाराम दादा पाटील

?  विविधा  ?

☆ गरज क्रांतीकारकांची… ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

माणूस परंपरेला चिकटून जगण्यातच धन्यता मानतो. तिथेच जीवनाची सार्थकता शोधत जगत राहतो.  त्याची ही जीवनशैली बदलण्यासाठी एका  तत्त्वनिष्ठ अजोड क्रांतीची गरज भासते आणि मग वेळोवळी सामाजिक गरजे नुसार तिच्यात काही बदलही घडत जातात. शस्त्राच्या धाकाने घडवला जाणारा बदल हा क्रांतीचा पहिला प्रकार आहे. पण घडलेली ही क्रांती तात्कालिक असते. कालांतराने तिच्यावर परंपरेचे दडपण येते. ती क्षीण बनते आणि शेवटी परिणाम शुन्य ठरते. प्रगतिशील विचार मांडणी आणि त्या नुसार विचारपूर्वक  केली जाणारी कृती हा क्रांतीचा दुसरा प्रकार आहे. पण हिच्यात सर्वसंमतीचा अभाव जाणवतो म्हणून तिच्यात म्हणावा तसा प्रभावी प्रभाव दिसत नाही. शिक्षणातून घडणारी क्रांती हा तिसरा प्रकार. ही क्रांती मात्र चिरंतन टिकणारी असते. कारण ती व्यक्तीमनाचा ठाव घेणारी असते व तिला भक्कम मजबूत पाया प्राप्त झालेला असतो. जनात होणा-या क्रांतीपेक्षा मानवी मनात होणारी क्रांती ही सर्वश्रेष्ठ असते आणि ती दिर्घ काळ टिकते. शिक्षणाने मने प्रगल्भ होतात. पहिल्या दोन्ही क्रांती शिक्षणामुळेच घडत असतात. म्हणूनच शैक्षणिक क्रांतीला सर्वोच्च स्थान प्राप्त झाले आहे हे नक्की. व्यक्तिच्या अंगी असणा-या सुप्त गुणांचा विकास, मानवी कर्तृत्वाला पोषक वातावरण निर्मिती, जीवन समृद्ध करणा-या चिरंतन मुल्याना प्रोत्साहन, स्वातंत्र्य, समता, बंधुता यांची शिकवण , आणि माणसाला मिळालेल्या मूलभूत  स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याचे कार्य ख-या अर्थाने शैक्षणिक क्रांतीच करत असते. म्हणूनच ती स्थायी स्वरुपाची  क्रांती आहे. आणि तिची  प्रेरणा गुरू मुळेच मिळते. जो माणसाला  अज्ञानापसून मुक्त करतो, वैचारिक दाशस्यातून व गुलामगिरी तून मुक्त करतो, जातीपातीच्या परंपरागत कैदखान्यातून मुक्त करतो, भूतकाळाच्या उसन्या आवेशातून मुक्त करतो, मानवीस्वभावात साठून राहिलेल्या विकृती पासून मुक्ती मिळवून देतो, लिंगभेदाच्या परंपरागत जाचक जुनाट समजुतींच्या विळख्यातून मुक्त करून नवविचार प्रेरणा देतो. तोच खरा गुरू असतो. तोच जीवनाला आकार देणारा मार्गदर्शक ठरतो.

माणसाला आपल्या जीवनमूल्यांची खरी जाणीव होऊन त्याच्या जीवनाला पूर्णत्व आणि कृतार्थता प्राप्त  करून घ्यायची असेल तर, माणसाच्या अंगी प्रज्ञा , प्रतिभा , प्रार्थना , नम्रता , प्रयत्न , व कृतज्ञता या सहा गुणांचा सुंदर समन्वय असणे अत्यावश्यक आहे. प्रज्ञा माणसाचा सर्वांगीण विकास करून योग्य सुधारणावादी पर्यावरण बनवते. प्रतिभेच्या साथीला सहवेदना आणि संवेदनशीलता असेल तर माणसाला सखोल स्वरुपात समजून घेता येते. त्या योगाने नाविन्यपूर्ण नव निर्मीती ही करता येते. माणसाच्या अंगी असणारा अहंकार नष्ट करून माणसाला ईश्र्वराच्या सानिध्यात नेण्यासाठी प्रार्थनेची आवश्यकता असते. नंम्रता माणसाच्या अंगी असणा-या मूलभूत स्वरुपाच्या चांगल्या गुणवत्तेला विनंम्रभावे अभिवादन करते. प्रयत्न माणसाला प्रगतीची वाटचाल करायला शिकवत उन्नतीच्या व यशाच्या दिशेने मार्गाक्रमण करावयास प्रेरणा देतो. कृतज्ञता माणसाला माणुसकी शिकवते. माणसांशी जवळीक साधते व केलेल्या उपकाराचे स्मरण ठेवून समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रवृत्त करते. प्राप्त परिस्थितीशी अथक संघर्ष करत उद्दिष्टांच्या दिशेने वाटचाल करणे वाटते तितके सोपे नाही. पण जो ध्येयोपासक असतो तो साधक बनतो . साधनाकरतो. आणि सा-या संकटावर मात करत यशाची वाट निर्धोकपणे चालत राहतो . त्यालाही क्रांतीच म्हणावे लागेल. मानवी जीवनात सुखापेक्षा दु:खेच अधिक असतात. पण जे दुःखाने दु:खी होत नाहीत,ते दु:खालाच दु:खी करून सहज विजय मिळवतात तेच खरे क्रांती कारक असतात. ते आपल्या दु:खाचे कधीच प्रदर्शन मांडत नाहीत. त्याचे भांडवलही करत नाहीत आणि त्यांच्या पुढे शरणागतीही पत्करत नाहीत. आज अशाच क्रांतीकारकांची गरज आहे. ते मिळाले तर भारत पुन्हा सुवर्ण भूमी होईल. यात काही शंका नाही. आजच्या काळाची ही प्रमूख गरज आहे .असे मला वाटते.

© श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पहिलं वहिलं…. ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

?इंद्रधनुष्य?

पहिलं वहिलं…. ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

 ‘पहिलं वहिलं,  देवाला वाहिलं’ असं लहानपणी ऐकायचो आम्ही. म्हणजे असं की बागेत लावलेल्या एखाद्या झाडाला पहिलं फळ आलं आणि ते पक्ष्यांचा तावडीतून सुटून आपल्यापर्यंत पोहोचलं तर ते आपण खायचं नाही . तर ते देवाला वाहायचं. का ?  तर तसं केल्यानं भरपूर फळं येतात म्हणे. !

आता ही श्रद्धा की अंधश्रद्धा हा वाद आपल्याला नकोय. मुद्दा एवढाच की पहिलं म्हणून त्याचं खूप खूप कौतुक. खरच ! काहीही असो, पहिलं म्हटलं की त्यात उत्सुकता, कौतुक, भीती, हुरहूर हे सगळं आलंच. ते पहिलेपण मनात घर करुन रहात असत. कधीतरी, कोणत्यातरी निमित्ताने आठवणींना उजाळा मिळातो आणि मग ते पहिलं वहिलं जे काही असेल ते आठवू लागतं.

आपली पहिली शाळा, पहिला वर्ग, पहिला बाक, पहिला मित्र, सगळं कसं सहजपणे आठवत जातं. शाळेचा पहिला दिवस, त्या दिवशीची आपली अवस्था आपल्याला आठवेलच अस नाही. पण घरातल्या वडिलधा-या मंडळींकडून कधी ना कधी तो समरप्रसंग आपण ऐकलेला असतो आणि आपल आपल्यालाच हसू येतं. आता मुलांना शाळेत सोडताना त्यांची होणारी अवस्था फार काही वेगळी असत नाही. कोणी हसत हसत शाळेला जात तर कोणी रडत रडत. कुणाला थोड्या वेळानंतर रडू येतं तर कुणी इतर सवंगड्यांकडून स्फूर्ती घेऊन रडू लागत. म्हणजे इतकी वर्षे लोटली तरी शाळेच्या पहिल्या दिवसाची अवस्था फार काही बदललेली नाहीच. मग डोळ्यासमोर येतो तो पहिला मित्र किंवा मैत्रीण. काहीतरी आमिषाने तरी आपण एकत्र आलेले असतो किंवा काहीतरी जरूरी म्हणून. पण मग हळूहळू होणा-या  या ओळखीतून मैत्रीचं बीज केव्हा रूजतं समजतही नाही. पुढे मोठेपणी हा मित्र आयुष्यभर आपल्या बरोबर असेलच असे नाही. पण त्याची आठवण, मिळून केलेला अभ्यास, केलेला दंगा हे मात्र आपल्या जवळच असतं. मग मोठेपणी कधीतरी आपण त्या शाळे जवळून जातो. कधी कुणाला सोडायला तर कधी आणायला. तेव्हा त्या जुन्या खुणा आपल्याला खुणावीत असतात. शालेय जीवनातल ते पहिलेपण पुनःपुन्हा डोळ्यांसमोर येत असतं. शाळेत असो नाहीतर नंतर काॅलेजात असो, आपण मिळवलेलं पहिलं बक्षीस, सर्वांनी केलेलं कौतुक, काॅलेजच्या मॅगझिन मधून छापून येणारी पहिली कविता किंवा कथा, स्पर्धेतील पहिलं भाषण, नाटकातला पहिला अभिनय, संगीत सभेतलं पहिलं गाणं; हे सगळं सगळं खर तर इतकं सुखावणारं असतं की त्यातून बाहेरच पडू नये असं वाटतं. या प्रत्येक पहिलेपणाच्या वेळेला केलेली धडपड, मनावर आलेलं दडपण, मनात असलेला संकोच, या सगळ्यानंतर मिळणारं यश आणि त्यामुळं पुढचा प्रवास ! पण कधी कधी पहिलं अपयश, पहिल्यांदा झालेली फजिती, लोकांसमोर पहिल्यादा बोलताना लटपटणारे पाय आणि उलटसुलट फेकलेली वाक्य, मॅच चालू असताना मस्त पोज घेऊन सुद्धा उडणारा त्रिफळा ! हे सारं आठवलं की आता मात्र हसू येतं. पण पहिल्यांदा ते झालं नसतं तर इथवर आलो तरी असतं का हा ही विचार मनात येतो आणि त्या पहिले पणाचही कौतुक वाटायला लागतं.

आपलं पहिलं पाऊल कसं पडलं, कुठं पडलं हे आपल्याला नाही आठवणार. पण घरातल्या बाळाची पहिली पाऊलं पडू लागली की आपल्याला होणारा आनंद आपण टाळ्या वाजवून साजरा करतोच ना ?बाळाचे पहिले बोबडे बोल त्याच्या मुखातून बाहेर पडल्या बरोबर त्याचा अर्थ आपल्याला नाही समजला तरी ते ऐकून, एखादे  सुरेल गीत ऐकण्यापासून मिळणारा आनंद आपल्याला होतोच की नाही. ?सायकल शिकताना पहिल्यांदा फोडून घेतलेले  गुडघे आणि नंतर शिताफीन चालवलेल्या सायकलची मजा आठवली की अजूनही हवेत तरंगल्यासारखं होतं. पहिल्यांदा जिंकलेली क्रिकेटची मॅच म्हणजे आपल्या दृष्टीनं वर्ल्डकप जिंकल्यासारखचं असतं. पहिल्यांदा केलेला चहा, तो कडवट झाला असला तरी किंवा अगदी बासुंदी झाली असली तरी, सगळ्या घरात कौतुकाचा विषय झालेला असतो. बहिणीने केलेल्या पहिल्या चपातीतून जगाच्या नकाशाच्या दर्शन झालं तरी चेष्टा करत करत का असेना, कौतुकाची थाप पडत असतेच !

पहिल्या पदवीच कौतुक तर काय सांगायलाच नको. बेकारातआणखी एकाची भर हे काही महिन्यांतच कळतं. पण पदवी मिळवताना मात्र आपण खूपच ‘उच्च विद्याभूषित ‘ झाल्याचं  समाधान असत. पुढे तो पहिला दिवस नोकरीचा असो किंवा व्यवसायाचा. नवे लोक, नवे विश्व,  नवी आव्हानं. आपण मात्र काल पर्यंत होतो तसेच असतो या पहिल्या दिवशी ! सगळेजण आपल्याकडे बघताहेत अस वाटत असत. प्रत्येक गोष्ट नव्याने शिकून  घेताना पुन्हा पहिलेपणा येतोच. शिकण्याशिवाय तर पर्याय नसतो. शिकायची उत्सुकता ही असते. अशा संमिश्र अवस्थेत ते पहिलं वहिलं चाचपडत पुढे जाणं चालूच असतं. मग पहिला पगार, पहिल्यांदा मिळणारी बढती, पहिली बदली, त्यानिमीत्ताने येणारे पहिले पहिले नवे नवे अनुभव, या प्रत्येक पहिलेपणात कमालीच उत्सुकता असते. मग ओढ असते ती एका नव्या प्रवासाची. प्रथमच नजरभेट होते कुणाशी तरी आणि चुकतो ठोका काळजाचा. ही झालेली पहिली ‘चूक’ आयुष्यभर जपण्यासाठी मात्र धडपड सुरू होते.

किती आणि काय काय आठवत जावं यालाही काही मर्यादा नाहीत. स्वतःच्या हातांनी लावलेलं पहिलं झाड. त्याला येणार पहिलं फूल. स्वतःच्या माडाला येणारा पहिला नारळ असो किंवा आंब्याच्या झाडावर दिसू लागणारी पहिली कैरी असो. फळ खाण्यातल्या आनंदापेक्षा ते आलय याचाच आनंद मनस्वी असतो. पहिला रेडिओ घरात येणार म्हणून तो ठेवण्यासाठी घरातल्या जुन्या लाकडी टेबलाची केलेली स्वच्छता, मग रेडिओची जागा पहिल्या टि. व्ही. ने घेताना तो खोलीत कुठे ठेवावा यावर झालेली चर्चासत्रं, पहिला लँडलाइन फोन येताना ‘ त्याची आवश्यकताच काय ‘ इथपासूनच्या शंका.  एक ना दोन. पहिली दुचाकी खरेदी करताना तिच्यासाठी घातलेल्या पायघड्या(की चाकघड्या म्हणू ?), खूप प्लॅनिंग करून घेतलेली चारचाकी, पहिल्या परदेश वारीसाठी केलेली मानसिक तयारी, त्यासाठी पचवलेले उपदेशांचे डोस आणि सूचनांचा मारा. सगळं सगळं आठवलं की त्या पहिलेपणात किती अप्रूप होतं याच कौतुकच वाटायला लागतं.

कुणाच्याही आयुष्यात घडणा-या या घटना. यात जगावेगळं  ते काय असतं? माझ्या आयुष्यात घडलं तसच थोड्याफार फरकानं तुमच्याही आयुष्यात घडतं. पण आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात ते पहिल्यांदाच घडत असत म्हणून त्याच कौतुक जगावेगळं असतं. उन्हाळा असह्य झाल्यावर, खूप खूप वाट पाहिल्यावर येणा-या पहिल्या पावसाचा जो आनंद असतो, अगदी तसाच आनंद या पहिलेपणात असतो. ते सगळं आठवत बसलं की नकळत डोळ्यातला पाऊस सुरू होतो.  गोड आठवणींच्या सरी घेऊन बरसत राहतो मनावर .  हळूहळू शांत होतं मन. पहिल्या पावसानंतरच्या तृप्त झालेल्या धरित्रीसारखं !

 

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तू वंशाची पणती.. ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे

सौ. स्वाती रामचंद्र कोरे

 ?  विविधा ?

☆ तू वंशाची पणती..  ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆

तू आलीस ,तू पाहिलेस

तू जिंकलेस सारे जग

आणि आमचे मन ही..

 

 तुझ्या चालण्यात,बोलण्यात

झळकत होता आत्मविश्वास,

आणि चेहऱ्यावर होते तेज

स्वतःला सिद्ध केल्याचे…

 

 तो किरीट डोईवर सजला होता नि डोळ्यातून वाहत होते

अश्रू….. आनंदाश्रू..

तुझ्या ही आणि आमच्या ही..

 

खरं तर ते अश्रू नव्हतेच

 

ती होती पोहोच संघर्षाची,

अपार अशा मेहनतीची,.

काळजात दबलेल्या कैक

हुंदक्याना नि सोसलेल्या                             

अपमानाच्या घावांना

वाट मोकळी करून दिलीस…

 

दुर्दम्य इच्छाशक्ती,जिद्दीच्या

बळावर आकाशाला गवसणी

घातलीस पाय मात्र जमिनीवर ठेवून …  ब्रम्हांड सुंदरी होताना

तू जगाला छान संदेश दिलास….

स्वतःवर विश्वास ठेवण्याचा व आतून बुलंद होण्याचा..

 किती सोप्या भाषेत तू आम्हाला जगण्याचे बळ दिलेस ,सोबत दिलीस नवी ऊर्जा ,आभाळ पेलण्याची…

 

 शेण गोळे झेलून सावित्रीने

अक्षर ओळख करून दिली.देशाचे सर्वोच पद पेलूनइंदिरा नी मनगटातील बळ

सिद्ध केले… सुनीता ,कल्पना चावलाने आकाशाला कवेत घेतले. कला, साहित्य,,नृत्य, नाट्य, संगीत  प्रत्येक क्षेत्रात…

पृथ्वी,,आकाश, पाताळ

साऱ्या ठिकाणी उमटत गेले

तुझ्या कर्तृत्वाचे ठसे…

 

  आज हर भारतीया ला

नाज वाटेल ते काम तू केलेस..

 

 खरेच काळ बदलतोय ग..

वंशाचा दिवा च हवा

म्हणणारा हा समाज.. आज वंशाची पणती ही

तितक्याच अभिमानाने

मिरवतोय..

तिच्या तेजाने झळाळून

निघतोय..

स्वतःची अपूर्ण स्वप्ने                                         

तिच्यात पूर्ण करताना

कृतार्थ होत जातोय…

 खरेच काळ बदलतोय..!

 

© सौ. स्वाती रामचंद्र कोरे

खानापूर,जिल्हा सांगली

मो.9096818972

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अस्तित्व… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

?विविधा ?

☆ अस्तित्व… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

गेले सात-आठ महिने आपली अस्तित्वाची लढाई चालू आहे.

एवढ्याशा सूक्ष्म विषाणूने सगळ्या मानवजातीला अस्तित्वाचा प्रश्न निर्माण केला. पश्चिमेकडील काही देशांत गेल्या डिसेंबरपासून ‘करोना’ रोगाने आपला प्रभाव दाखवला आणि लाखो लोक या रोगाला बळी पडले. आपल्या भारतापर्यंत ही लाट येण्यास दोन-तीन महिने गेले. साधारणपणे मार्च २०२० पासून आपण कोरोनाचा सामना करीत आहोत. सुरवातीला प्रधानमंत्री यांनी आपल्याला या गोष्टीची वेगवेगळ्या प्रकारे जाणीव दिली.

सुरवातीला घंटानाद, त्यानंतर दीपप्रज्वलन तर एकदा ठराविक काळ दिवे घालवणे यासारख्या गोष्टींनी भारतात एकात्मतेची भावना निर्माण केली. त्यानंतर लॉक डाऊन चा काळ आपण

घालवला.आता या कोरोनालाच आपण सरावल्यासारखे झालो आहोत.. आणि पुन्हा कामाला लागलो आहोत अर्थात मनातील चिंतेचा जंतू काही गेलेला नाही. त्यामुळे मास्क, सोशल डिस्टंसिंग आणि सॅनिटायझरचा उपयोग करुन आपण रोगापासून दूर राहण्याचा आणि आपले अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत आहोत.

 हा अस्तित्वाचा प्रश्न फार प्राचीन काळापासून सजीवांना भेडसावत आहे . लाखो वर्षापूर्वी पृथ्वीवर सजीव सृष्टी निर्माण झाली. मत्स्य, कूर्म, वराह ….. अशा अवस्थेतून स्थित्यंतर होत मानवी सृष्टी अस्तित्वात आली आणि त्यानंतर मानवाने मेंदूच्या जोरावर साऱ्या जीवसृष्टीला वेठिला धरले. निसर्गाचा स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करून घेतला. विज्ञानाच्या जोरावर मानवाने स्वतःची प्रगती केली. त्यामुळे आपण निसर्गावर अवलंबून नाही असा काहीसा ‘भ्रम’ माणसाला झाला. हिंदू संस्कृतीत पंचमहाभूतांना म्हणजेच निसर्गाला देव मानून महत्व दिले गेले. त्यामुळे माणसाचे अस्तित्व टिकवले किंवा निसर्गानुरूप आपण आपले जीवन समृद्ध केले. निसर्गाप्रती कृतज्ञता ठेवली पण हळूहळू काळ बदलत गेला आणि विज्ञान मोठे की निसर्ग असा प्रश्न निर्माण होऊ लागला. निसर्गातील प्रत्येक प्रश्नावर माणूस उपाय शोधू लागला. जसे बाहेर खूप ऊन असले तरी आपण एसीत बसून थंड हवा घेऊ शकतो किंवा एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना जलदगती वाहन म्हणून विमानाचा वापर करू शकतो.

घरातील प्रत्येक वापराची गोष्ट करताना ते अधिक सुलभ होण्यासाठी विज्ञानाचा उपयोग करतो. यामुळे आपले ‘अस्तित्व’ आपण सुखकर झाले असे म्हणतो. काही वर्षांपूर्वी रोगराई, वादळे, भूकंप, अतिवृष्टी यासारख्या संकटांनी माणसाला हतबल केले होते. पण विज्ञानाच्या प्रगतीमुळे आपण बऱ्याच रोगांवर मात केली आणि भूकंप, वादळं यासारख्या संकटा संबंधी पूर्वसूचना मिळतील अशी यंत्रसामग्री निर्माण केली की ज्यामुळे मनुष्यहानी कमी होईल  याची काळजी घेता येते. माणूस आपले’ ‘अस्तित्व” टिकवण्यासाठी सतत कार्यरत राहिला.

पण नैसर्गिक नियमानुसार जसे सजीव निर्माण होतात तसा त्यांचा नाशही  होणे गरजेचे असते. यावरून मला परिक्षीत राजाची गोष्ट आठवते. त्याला नाग कुलापासून धोका होता म्हणून सर्पकुलातील प्राण्यांना प्रवेश करण्यास त्याने जागाच ठेवली नव्हती. स्वतःभोवती त्याने जणू पिंजराच उभारला होता. पण खाण्याच्या बोरातून त्याला गिळंकृत करणा-या तक्षकांने कधी प्रवेश केला हे कळलेच नाही आणि त्याचा मृत्यू ओढवला!

 यावरून असे दिसते की, कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपले अस्तित्व नष्ट करण्याची यंत्रणा या निसर्गात आहे आणि त्याच्याशी सामना करायची जिद्द माणसात आहे.

सध्याचा कोरोना हा जगातील लोकसंख्या नियंत्रणाचा एक परमेश्वराचा उपाय असेल किंवा माणसाच्या अति लोभी आणि अहंकारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी हे’ ‘ कोरोनास्त्र’ आले असेल. कोरोनाच्या या काळात माणसाला स्वतःची हतबलता जाणवली आहे .तसेच या निमित्ताने काही चांगले बदल ही झाले आहेत.गरीब-श्रीमंत लहान-मोठा ,जाती भेद यासारख्या गोष्टी कोरोनाच्या सार्वत्रिक आजारामुळे थोड्या कमी होण्यास मदत झाली आहे.

एकमेकांविषयी चांगली सहभावना ही जागृत झाली आहे.

ही माणसाच्या अस्तित्वाची निकराची लढाई आहे. या रोगावरील औषधे लस थोड्याच काळात येईल आणि आपण या संकटातूनपार पडू.

२०२० सालच्या आठवणी काढताना लक्षात येतंय की’ संपेल हे सर्व’ या आशेवर एक वर्ष संपून गेलं! व्हॅक्सीनेशन सुरू झाले, तरी अजून कोरोना गेला नाहीये. अजूनही मनावर या सगळ्याचे टेन्शन तर आहेच, पण पहिली लाट ओसरली म्हणेपर्यंत दुसऱ्या लाटेचे आगमन!या सर्वातून बाहेर केव्हा पडणार कुणालाच माहीत नाही!फरक इतकाच की आपण या सर्व गोष्टींना सरसावलो आहोत. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टंन्सिंग हे जगण्यासाठी अविभाज्य घटक झाले आहेत.मुक्त जगायचं विसरूनच गेलो आहोत.अजून काही दिवस, काही महिने असेच जातील!मग तिसरी लाट येईल असं ऐकतोय! या सर्वातून माणसाच्या अस्तित्वाची जाणीव अधिक तीव्र झाली आहे. ज्या ज्या वेळी कोणतीही गोष्ट अति होते तेव्हा परमेश्वर म्हणा किंवा निसर्ग आपले अस्तित्व दाखवून देतो आणि आठवते…..

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! ☆ स र्व ज्ञा नी ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? स र्व ज्ञा नी ! ??

“पंत हा तुमचा पेपर, निघतो, जरा घाईत आहे !”

“अरे मोऱ्या थांब जरा, तुला एक विचारायचं होतं!”

“बोला ना पंत !”

“अरे गाढवा, काल माझं एक काम होतं तुझ्याकडे म्हणून तुला मोबाईल लावला, तर ‘समाधान सल्ला केंद्राला फोन केल्याबद्दल धन्यवाद ! वैयक्तिक सल्ल्यासाठी एक दाबा, कौटुंबिक सल्ल्यासाठी दोन दाबा, प्रेम प्रकारणाच्या सल्ल्यासाठी…..”

“तीन दाबा ! बरोबर ना पंत ?”

“हो, बरोबर. आता ही सल्ला केंद्राची काय नवीन भानगड सुरु केल्येस तू मोऱ्या ?”

“अहो भानगड कसली पंत, घरी बसल्या बसल्या चार पैसे मिळवायचा आणि त्यातून झालीच तर थोडी समाजसेवा करायचा उद्योग चालू केलाय एवढच !”

“म्हणजे रे मोऱ्या ?”

“अहो पंत, हल्ली सगळेच लोकं काहींना काही समस्यांचे शिकार झालेले आहेत. त्यातून काही जणांना नैराश्य येवून, त्या पैकी काही जणांची मजल आत्महत्या करण्यापर्यंत गेल्याच तुम्ही पेपरात वाचल असेलच !”

“खरं आहे तुझं मोऱ्या, हल्ली एवढ्या तेवढ्या कारणावरून आत्महत्या कारण्याच प्रमाण वाढलंय खरं !”

“बरोबर, म्हणूनच अशा डिप्रेशनमधे गेलेल्या लोकांसाठी मी ‘समाधान सल्ला केंद्र’ सुरु केलं आहे !”

“हे बरीक चांगल काम करतोयस मोऱ्या, पण तुझ्याकडे सल्ला मागणारे ना तुझ्या ओळखीचे ना पाळखीचे, ते तुझ्याकडे मोबाईल वरून त्यांना पाहिजे तो सल्ला मागणार, मग याच्यातून तुला अर्थप्राप्ती कशी होते ते नाही कळलं मला !”

“पंत, तुम्ही नेट बँकिंग बद्दल ऐकलं असेलच !”

“हो ऐकून आहे खरा, पण त्यात फसवलं जाण्याची भीती असते असं म्हणतात, म्हणून मी माझ्या अकौंटला तो ऑपशनच ठेवला नाहीये बघ !”

“ते ठीक आहे पंत ! पण माझ्याकडे सल्ला मागणाऱ्यांना मी ठराविक रक्कम माझ्या अकाउंटला जमा करायला सांगतो आणि ती तशी जमा झाल्याचा मेसेज मला माझ्या बँकेतून आल्यावरच मी त्यांना पाहिजे तो सल्ला देतो !”

“अस्स, म्हणजे पहिले दाम मग तुमचं काम, हे सूत्र तू अवलंबल आहेस तर !”

“अगदी बरोबर पंत, म्हणजे पैसे बुडण्याची भीतीच नाही !”

“ते सगळं खरं रे मोऱ्या, पण प्रत्येकाच्या निरनिराळ्या समस्यांवर तुझ्याकडे समाधानकारक उत्तर कशी काय असतात बुवा ?”

“पंत माझ्याकडे कुठे उत्तर असतात !”

“अरे गाढवा, पण तूच तर प्रत्येकाला त्याच समाधान होईल असं उत्तर देतोस नां ?”

“हो पंत, पण त्यासाठी मी आमच्या पेरेन्ट कंपनीचा सल्ला घेतो !”

“आता ही तुझ्या पेरेन्ट कंपनीची काय भानगड आहे मोऱ्या ?असं कोड्यात बोलू नकोस, नीट सविस्तर मला समजेल असं काय ते सांग बघू !”

“त्याच काय आहे ना पंत, माझ्या सासूबाई स्वतःला ‘सर्वज्ञानी’ समजतात आणि त्यांनी सुद्धा त्यांचे ‘सर्वज्ञानी सल्ला केंद्र’ नावाचे मोबाईलवरून सल्ला देण्याचे केंद्र सुरु केले आहे.”

“बर मग ?”

“अहो त्या वरूनच माझ्या बायकोच्या डोक्यात, आपण पण असं सल्ला केंद्र मोबाईलवर चालू करावं असं आलं आणि सासूबाईंच्या त्या सर्वज्ञानी सल्ला केंद्रलाच मी आमची पेरेन्ट कंपनी म्हणतो !”

“अस्स !”

“मग मी काय करतो पंत माहीत आहे, मला आलेल्या सगळ्या समस्यांवरचा सल्ला मी मोबाईलवरून, माझ्या पेरेन्ट कंपनीला, म्हणजेच माझ्या सासूबाईंच्या ‘सर्वज्ञानी सल्ला केंद्राला’ विचारतो आणि त्यांनी दिलेला तोच सल्ला पुढे…..”

“ढकलून मोकळा होतो, बरोबर ?”

“बरोब्बर पंत !”

“पण काय रे मोऱ्या, तुझ्या सासूबाई तू त्यांचा एकुलता एक जावई  असलास म्हणून तुला काय नेहमीच फुकटचा सल्ला देतात का ?”

“नाही हो पंत ! अहो मी त्यांना प्रत्येक वेळेस, वेगळेच नांव सांगून, मला एखाद्याने किंवा एखादीने विचारलेला सल्ला त्यांना विचारून त्याचे उत्तर घेतो आणि तोच माझा सल्ला म्हणून पुढे पाठवतो आणि सासूबाईंच्या अकाउंटला पैसे जमा करतो ! तेवढीच त्यांना आर्थिक मदत पण होते !”

“अरे पण तुला यातून कसे काय अर्थार्जन होते ते नाही कळलं मला !”

“पंत, सध्याचा जमाना हा कमिशनचा जमाना आहे, हे तुम्ही पण मान्य कराल ! ‘माझं काय ?’ हाच प्रश्न कुठच्याही व्यवहारात हल्ली लोकांचा असतो ! मग मी तरी त्याला कसा अपवाद असणार ?”

“तू म्हणतोयसं ते खरं आहे मोऱ्या, हल्ली जमानाच आलाय तसा, पण मग तू काय करतोस ?”

“पंत, मी जेवढे पैसे सासूबाईंना देतो, त्यावर माझे दहा टक्के कमिशन आकारून सासूबाईंनी दिलेला सल्ला पुढे ढकलतो !”

“धन्य आहे तुझी मोऱ्या !”

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

१७-१२-२०२१

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्व प्न ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

⭐ स्व प्न ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“स्वप्नात रंगले मी

चित्रात दंगले मी

सत्यातल्या जगी या

झोपेत जागले मी”

हे आशाताई आणि बाबुजींच्या आवाजातील, ‘आम्ही जातो आमच्या गावा’ या चित्रपटातील युगल गीत माझ्या पिढीच्या लोकांना नक्कीच आठवत असेल ! हल्लीच्या पिढीला ‘युगल’ या शब्दा पेक्षा ‘गुगल’ शब्द जास्त जवळचा, त्यामुळे ‘युगल’ शब्दाचा अर्थ माहित असणे दूरची गोष्ट झाली ! पण जिथे नुकत्याच पार पडलेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात, “स्वातंत्र्य” हा शब्द “वि. दा. सावरकर मंचाच्या” फलकावर चुकीचा लिहून मराठीचे धिंडवडे निघतात, तिथे या आजच्या तरुण पिढीला दोष देण्यात तरी काय अर्थ आहे म्हणा ! थोडे विषयांतर झाले पण त्याला इलाज नाही ! असो ! आता गाण्याच्या वरच्या चार ओळींकडे वळतो. त्यात त्या नयिकेचे (उमा) आपल्या नायकाला (श्रीकांत मोघे) भेटण्याचं स्वप्न सत्यात उतरल्याच, ती गाण्यातून सांगत असते ! शेवटी ती नायिका असल्यामुळे तिच्या मार्गात खलनायकाने कितीही अडथळे आणले तरी, हे गाणं सिनेमातंल असल्यामुळे नयिकेच स्वप्न सत्यात उतरलं असेल, तर त्यात नवल ते काय ?

स्वप्न ! मानवाच्या मनातल्या सुप्त इच्छांची पूर्ती करायची सोय त्या विधात्याने काय मस्त करून ठेवली आहे नां ? पण स्वप्न पडायला हव असेल तर त्यासाठी आधी झोपावं लागतं असं म्हणतात ! आता तुम्ही म्हणालं, हे काय नवीन सांगितलंत तुम्ही ? झोपल्याशिवाय स्वप्न कशी बघणार, पडणार ? तुमचं म्हणणं बरोबर आहे मंडळी ! पण काही काही जणांना जागेपणी सुद्धा स्वप्न पडतात असं ऐकून आहे, प्रत्यक्ष मला तसा काही अनुभव नाही !

लहान बाळांना स्वप्न पडत असतील का ? असावीत, हे झालं माझं वैयक्तिक मत ! कारण कसं असतं नां, आपण अनेकदा बघितलं असेल, की कधी कधी बाळ गाढ झोपेत असतांना मधेच दचकून परत झोपी जात किंवा जाग होऊन रडायला तरी लागतं ! मग त्याची आई त्याला आपल्या कुशीत घेवून थोपटून, थोपटून परत झोपवते आणि आपला एक हात हळूच त्याच्या अंगावर ठेवते ! तो आईच्या हाताचा आधार बाळाला सुखावतो ! मग त्याची बहुतेक खात्री पटत असावी की आता आपली आई आपल्या जवळ आहे आणि मग ते बाळ निर्धास्तपणे परत निद्रा देवीच्या अधीन होतं !

पूर्वी घरी कोणी पाहुणे आले की, घरातल्या लहान मुला, मुलींना त्यांचा एक प्रश्न हमखास असायचाच ! “काय रे, कोण होणार तू मोठेपणी ?” त्यावर, मुलगा असेल तर आपलं गळणार नाक शर्टाच्या बाहीला किंवा मुलगी असेल तर फ्रॉकला पुसत पुसत आपल्या बोबड्या बोलात तो किंवा ती “डॉक्टल” अस उत्तर देई ! पूर्वीचे आई बाबा, मुलगा किंवा मुलगी शाळेतून कॉलेजमधे जायला लागल्यावर, आपलं डॉक्टर किंवा इंजिनियर होण्याचं अर्धवट राहिलेल स्वप्न आपल्या मुलाने किंवा मुलीने पूर्ण करावं यासाठी त्यांच्या मागे लागायचे ! सांप्रतकाळी तर आठवी नववी पासूनच, पप्पा मम्मी आपल्या मुलांचा कल लक्षात न घेता, त्यांच्या स्वतःच्या स्वप्ना नुसार तो किंवा तिने मोठेपणी कोण व्हावे हे ठरवून मोकळे होतात आणि त्या प्रमाणे त्यांच ब्रेन वॉशिंग चालू करतात !

आपला मेंदू तरतरीत ठेवण्यासाठी आपल्याला स्वप्ने पडतात अस एक शास्त्रीय सिद्धांत सांगतो ! त्यामुळे मेंदूची दीर्घकालीन स्मृती जतन करण्याची ताकद वाढते आणि तो जास्त कार्यक्षम होतो ! पण अजून तरी आधुनिक सायन्सला स्वप्न का पडतात याचा शोध लावता आला नाहीये, हे ही तितकंच खरं ! त्यामुळे आपल्या भारतीयांची “मनी वसे ते स्वप्नी दिसे” ही पूर्वापार चालत आलेली थियरी मनाला सध्या तरी जास्त जवळची आणि खरी वाटून जाते !

सध्या सामान्य माणूस कुठल्या ना कुठल्या समस्येने ग्रासलेला आहे. अशावेळी आजच्या अग्रेसिव्ह मार्केटिंगच्या जमान्यात, काही बोगस अल्पायुषी कंपन्या, लोकांना कधीही प्रत्यक्षात न येणारी अनेक स्वप्न हसत खेळत विकून, स्वतःच उखळ पांढरं करून लोकांचे खिसे रिकामे करतांना आपण बघितलं असेल किंवा काही लोकांनी ते अनुभवलं पण असेल !

कोणाला कसली स्वप्न पडावीत हा ज्याचा त्याचा प्रश्न ! हल्ली, गल्ली गल्लीतल्या भाई लोकांना पण, उपरती होऊन आपापल्या कारकिर्दीच्या मध्यातच, सर्व काळे धंदे सोडून राजकारणाच्या पांढऱ्या धंद्यात पडण्याची स्वप्न पडतात ! त्यातील काही जणांची स्वप्न साकार होऊन, त्यांना मंत्रिपद मिळाल्याचे आपण पहात आहोतच !

त्याच प्रमाणे हल्लीचे भोंदू बुवा, महाराज आणि माताजी सुद्धा आपल्या भोळ्या भक्तांना “बालका, कालच आमच्या स्वप्नात प्रत्यक्ष भगवंतांनी येवून, तुझ्या समस्येवर अमुक तमुक उपाय सांगितला आहे” अशी थाप मारून स्वतःच्या स्वप्नांचा बाजार मांडताना आपण, आज पण दुर्दैवाने पहात आहोत !

जगात रोज कुठे ना कुठे, कसले ना कसले तरी पुरस्कार वितरण सोहळे होत असतात ! त्यातील ९० टक्के पुरस्कार विजेते, “हा पुरस्कार मिळवण हे माझं लहानपणापासूनच स्वप्न होतं” अशी कडकडीत थाप मारतात, असं माझं स्वप्नातलं मत नसून सत्यातलं मत आहे ! कारण तिच्या किंवा त्याच्या लहानपणी हा पुरस्कार मुळात अस्तित्वात तरी होता का, याचा विचार हे लोकं हा डायलॉग मारायच्या आधी करतच नाहीत ! उगाचच “माझं लहानपणीच स्वप्न साकार झालं वगैरे वगैरे” हे नेहमीच टाळ्या मिळवणार वाक्य बोलून मोकळे होतात झालं !

सुरवातीलाच म्हटल्या प्रमाणे मानवाच्या सुप्त इच्छांची पूर्ती करायची सोय त्या विधात्याने स्वप्न रूपाने केली असली तरी, ती पुरी करतांना, शेवटी तोच करता करविता असल्यामुळे त्याने एक चांगली खबरदारी सुद्धा या स्वप्नांच्या बाबतीत घेतल्याचे आपण, माझ्यासारखा नीट विचार केलात तर आपल्याला पण जाणवेल ! आता तुम्ही म्हणालं कोणती खबरदारी ? सांगतो मंडळी ! आपल्या स्वप्नात (जागेपणी अथवा झोपल्यावर) जर एखादी व्यक्ती आली, तरी त्या व्यक्तीच्या स्वप्नात आपण नसतोच नसतो याची आपण मनाशी पक्की खात्री बाळगून असा ! आणि विधात्याच्या या अशा खबरदारीमुळेच सगळी मानव जात सुखेनैव झोपून आपापल्या स्वप्नात दंग आहे, हे विसरून कसं चालेल ? आणि तसं जर का नसतं तर जगात काय हलकल्लोळ झाला असता, हा एका स्वतंत्र लेखाचा विषय होईल ! एक साधं उदाहरण द्यायच झालं तर विधात्याच्या या खबरदारीमुळे सध्याच्या कित्येक हिरोईन्स आणि हिरो सुखेनैव झोप घेतायात ! नाहीतर त्या सगळ्या स्वप्न सुंदरीच्या आणि आदर्श हिरोंच्या झोपेचं पार खोबरं होऊन, त्यांच्या स्वप्नांच काय झालं असत याचा विचार मला जागेपणी तर सोडाच, पण माझ्या एखाद्या स्वप्नात सुद्धा करता येणार नाही !

मनुष्य प्राण्याला जशी कधी ना कधी स्वप्न पडतात, तशी पशु पक्षांना देखील पडत असतील का, हा संशोधनाचा विषय ठरावा ! हल्लीच्या प्रगत विज्ञानाने तसा शोध लावला असेल, पण त्या बद्दल मी माझ्या जागेपणी काही वाचल्याचे अथवा स्वप्नात काही पहिल्याचे आता तरी आठवत नाही !

शेवटी, आपल्या सगळ्यांनाच जागेपणी अथवा झोपेत पडलेली सगळीच चांगली स्वप्ने पूर्णत्वास नेण्यास मदत कर, अशी त्या ईश्वरा चरणी प्रार्थना करतो !

ता. क. – मंडळी सध्या मी भायखळा येथील राणीच्या बागेत, कुठल्याही पिंजऱ्यात न राहता, रोज ज्यांच्यावर लाखो रुपये खर्च होतात त्या “पेंग्विन” पक्षांना, त्यांच्या मातृभूमीची स्वप्ने पडतात का, यावर मोफत संशोधन करत आहे !

© श्री प्रमोद वामन वर्तक

१२-१२-२०२१

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘स्वयंपाकघर…बदलती रुपे’ – भाग 2 ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ ‘स्वयंपाकघर…बदलती रुपे’ – भाग 2 ☆ श्री अरविंद लिमये ☆

 ……………….स्वयंपाकघरातल्या अत्यावश्यक वस्तू आज कालबाह्य झाल्या असल्या तरी माझ्यासाठी मात्र त्यांच्या आठवणी आजही मोलाच्या आहेत.

काळ बदलला.गरजा बदलल्या.घराचं स्वरुप जसं बदललं तसंच स्वयंपाकघराचंही. आमच्या संसारात आधीच्या स्वयंपाकघरातल्या चुलीची जागा आधी पितळी टाकीच्या आवाजाच्या स्टोव्हनं, नंतर वातीच्या स्टोव्हनं न् पुढे खूप वर्षांनंतर आधी  ‘ पांचाल’ नावाच्या हिरव्या रंगाच्या बीडाच्या न् नंतर स्टीलच्या गॅसशेगडीने घेतली होती.चुल नसल्याने स्वयंपाकघरात स्वयंपाकाचा कट्टा आला.पाटांची जागा फोल्डिंगच्या डायनिंग टेबलने घेतली. स्टोव्हचा काकडा,स्टोव्हची पीन,राॅकेलचा पाच लिटरचा कॅन,पितळाच्या भांड्यांची जागा घेतलेली स्टीलची भांडी,लोखंडी तव्याच्या जागी आलेले आधी अल्युमिनीयमचे न् नंतरचे निर्लेपचे तवे,अडगळीत गेलेल्या जाळीच्या कपाटाची जागा घेणारा फ्रीज ही कालच्या स्वयंपाकघराने स्विकारलेली अल्पकाळातली स्थित्यंतरे.खूप नंतर नवीन घरी किचन ट्राॅलीज् आल्या.मुलाचा संसार सुरु झाल्यावर फ्रीजच्या सुधारलेल्या आवृत्त्यांपाठोपाठ मायक्रोवेव्ह न् ओव्हनही.

परवाच्या न् कालच्या स्वयंपाकघराची ही रुपं मला खूप जवळून अनुभवता आली.उद्याचं स्वयंपाकघर कसं असेल ते काळ नव्हे तर उद्याची नवी पिढीच ठरवेल.त्यामुळे ते कसे असेल याची कल्पना करण्यापेक्षा ते कसं असावं हे सांगणे मला अगत्याचे वाटते.

पूर्वीच्या घरापासूनच घराचा अविभाज्य भाग असणाऱ्या कांही जागानाच घराने स्वतःचं नाव बहाल करीत मनापासून सामावून घेतलंय.स्वयंपाक’घर’, देव’घर’, माज’घर’ ज्यात ‘घर’ शब्दशः खऱ्याअर्थानं सामावलेलं असायचं अशा मोजक्या जागा.त्यातलं देवघर बऱ्याच घरातून हद्दपार झालंय.माजघराची पूर्वीची वैशिष्ट्ये आस्तित्त्वातच नाहीत आणि स्वयंपाकघराची जागा ‘किचन’ने घेतलीय.

हे खरंतर वरवरचे बदल आहेत.काळानुरुप बदललेल्या गरजांनुसार हळुहळू झालेले न् मनापासून स्विकारले गेलेले.तरीही पूर्वीचा साळढाळपणा नसला तरी माणसं ‘ तीच ‘आहेत.ती ‘ तशीच ‘ असावीत ही अपेक्षा मात्र अवास्तव ठरेल हे लक्षात घ्यायला हवं.

‘स्वयंपाकघर ‘ या संकल्पनेत फक्त अन्न शिजवणे नाही, तर स्वच्छतेला प्राधान्य देऊन शुचिर्भूत पध्दतीने ते शिजवणे अभिप्रेत आहे. रांधणाऱ्याच्या मनातल्या आपुलकी, प्रेम आणि सद् भावना  या गृहितच आहेत.हे सगळं किती आवश्यक आहे हे अलिकडच्या कोरोनाकाळाने दाखवून दिलेलं आहेच. हव्यासाने, भौतिक सुखाच्या हव्यासाने स्विकारलेली प्रदुषित जीवनशैलीच कोरोनाच्या प्रसाराला पूरक ठरल्याचे लक्षात आल्यानंतर तरी स्वच्छता पालनाचा विचार मास्क न्  सॅनिटायझर वापरापुरता मर्यादित न ठेवता तो खानपानाच्या सवयींच्या योग्यायोग्यता तपासून पहाण्याइतका सखोल व्हायला हवा.मग उद्याच्या किचनमधे स्वयंपाक स्री करते,घरातला पुरुष करतो,एकमेकांच्या सोयीनुसार दोघांपैकी कुणीही आलटून पालटून करतात की  घरी नेमलेली स्वैपाकीण किंवा आचारी करतो हा निर्णय प्रत्येक घराचा वेगवेगळा असला तरी त्यात Quality control लाच महत्त्व असावे.हाॅटेलमधून मागवून विनासायास भूक भागवण्यात समाधान मानण्यातले धोके ओळखून जेवणाला

 ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ‘ का म्हणतात हे समजून घेऊन त्यादिशेने प्रयत्नशील रहाणे अगत्याचे ठरेल.थोडक्यात स्वतःच्या प्राधान्यक्रमात नवे चकचकीत किचन खऱ्या अर्थाने

‘परिपूर्ण किचन ‘असण्याला प्राधान्य देण्यात यावे असे मनापासून वाटते. 

समाप्त

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘स्वयंपाकघर…बदलती रुपे’ – भाग 1 ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ ‘स्वयंपाकघर…बदलती रुपे’ – भाग 1 ☆ श्री अरविंद लिमये ☆

‘स्वयंपाकघर’ या शब्दाला लगडलेल्या असंख्य आठवणी मनात आहेत. माझ्याच नजरेसमोर या प्रदीर्घ काळात माझ्या अंगवळणी पडत, हळूहळू प्रत्येक गोष्टच तिचं मूळ रुप अनोळखी वाटावं इतकी बदलत गेलेली आहे. त्याला स्वयंपाकघर तरी अपवाद कसं असणार..?स्वयंपाकघराच्या स्वरुपाच्या जुन्या रुपाची आठवण आज आवर्जून आठवताना मात्र कल्हई केलेल्या भांड्यासारखी लखलखीत रुपात नजरेसमोर येतेय.लिहिण्याच्या ओघात सहज आलेला ‘कल्हई’ हा शब्द पूर्वीच्या स्वयंपाकघरासाठी आजच्या भाषेत सांगायचं तर Must च होता.

माझ्या दृष्टीने माझ्या बालपणापासूनच्या आठवणीतलं स्वयंपाकघर म्हणजे कालचं नव्हे.परवाचं.माझ्या संसारातलं स्वयंपाकघर कालचं.पण आधी थोडं परवाच्या स्वयंपाकघरा बद्दल. ते आजच्या ‘किचन’ पेक्षा तर खूपच वेगळं होतं.तेव्हा त्याचा अविभाज्य भाग असणाऱ्या , एखादा अपवाद वगळता , जवळजवळ सर्वच वस्तू आज कालबाह्य झालेल्या आहेत.वस्तूच नव्हे तर तिथल्या कामाच्या पद्धतीही..!

आम्ही मुलं साखरझोपेत असतानाच बागेतल्या पक्षांच्या किलबिलाटाआधीच, लवकर उठून स्वयंपाकघरात कामाला लागलेल्या माझ्या आईच्या हातातल्या बांगड्यांची किणकिण सुरु होत असे.तो मंजूळ आवाज इतक्या सवयीचा होऊन गेलेला होता की आजही इतक्या वर्षांनंतर या जुन्या आठवणी नजरेसमोरुन सरकत असताना ती किणकिण एखाद्या पार्श्वसंगीतासारखी मला ऐकू येत असल्याचा भास होतोय. पहाटेच नव्हे तर दिवसभराच्याच आईच्या स्वैपाकघरातल्या वावराची ती किणकिण ही एक हवीहवीशी वाटणारी खूण आहे माझ्या आठवणीतली.

‘चूल’ हा तेव्हाच्या स्वयंपाकघराचा अविभाज्य भागच.घरी कर्त्याबाईची पारोशी..म्हणजे आंघोळी आधीची.. कामं सुरु व्हायची ती चुलीपासूनच.घरातली इतर सगळी उठण्यापूर्वीच आधी स्वयंपाकघरातला केर काढून चूल सारवून घेतली जायची.हे सारवण नित्याचेच खास काम.पूर्वी सगळीच घरं मातीची असायची. बांधकामात सर्रास वापरली जाणारी पांढरी मातीच चुलीच्या सारवणासाठी वापरली जायची. एखाद्या निरुपयोगी जुन्या भांड्यात  कालवलेल्या तशा पांढऱ्या पातळसर मातीत जुन्या कापडाचा बोळा बुडवून आई संपूर्ण चूल आतून बाहेरुन सारवून घ्यायची.चूल आणि चूलीमागचा भिंतीचा अर्धा भागही. एरवी चुलीत जळणाऱ्या लाकडांच्या धगीने न् धुराने चूल आणि मागच्या भिंतीचा थोडा भागही काजळून जायचा.ते सगळं टाळण्यासाठी म्हणून हे सारवणं आवश्यक असायचं.दिवसभरातल्या चुलीतल्या उष्णतेने टवके उडालेलं ते सारवण दुसऱ्या दिवशी पहाटे आधी साफ करुन केर काढला की चूल पेटवण्यापूर्वी  पुन्हा नवीन सारवण.आम्हा मुलांना सकाळी जाग आल्यानंतर दृष्टीस पडायची ती ही अशी सारवून त्यावर गोपद्मं न् ‘श्री अन्नपूर्णा प्रसन्न’ या रांगोळीलेखल्या रुपाने सजलेली साजरी चूलच.

आजही ती चूल तिचं आस्तित्त्व विरलं असलं तरी  ‘चूल आणि मूल’, ‘ घरोघरी मातीच्या चुली ‘ ‘चुलीतली लाकडं चुलीतच जळायची’अशा कितीतरी म्हणींच्या रुपात अजरामर झालेली आहे.

चहाचं आधण, चहा टाकणं,स्वयंपाकपाणी,पारोशी कामं,सोदणं (हात पुसायला आणि गरम भांडी चुलीवरुन उतरवायला आईच्या कमरेला सतत खोचलेलं असणारं स्वच्छ फडकं)पाटपाणी,पानं घेणे, जेवणखाण, जेवायला वाढणे,पंक्तीत हवो नको  पहाणे…या सारखे रोजच्या वापरातले स्वयंपाक, स्वयंपाकघर,आणि जेवण यांच्याशी निगडित अनेक रुढ बोलीभाषेतले शब्द हल्ली क्वचितच कधी ऐकायला मिळतात.

पूर्वी पितळेची भांडी, पातेली,ताटंवाट्या,तांबे,हे स्वयंपाकघराचं ऐश्वर्य असायचं.स्वयंपाक पितळेच्या भांड्यापातेलीतच शिजायचा आणि पितळेच्या ताटंवाट्यातच वाढला जायचा.आमटी करताना वापरायला चिंचेचा कोळ काढून घेऊन राहिलेली चिंच ही सगळी ताब्यापितळेची भांडी घासून लखलखीत करायला आई आठवणीने बाजूला  ठेवायची.धुणीभांडी बहुतेक घरांमधे मुली हाताशी येईपर्यंत आईच करायची.जळकी भांडी घासताना हात भरुन यायचे म्हणून भांडी,पातेली,तवा चुलीवर चढवण्यापूर्वी त्यांच्या बाहेरच्या भागाला आई आधी माती कालवून लावायची न् मग चुलीवर चढवायची.पितळेची ही सगळीच भांडी, ताटं-वाट्या यांना अन्न कळकू नये म्हणून कल्हई लावून घेतली जायची.कल्हईवाला  ठराविक काळाने हाकारे देत रस्त्यावरुन फिरायचाच.ते कल्हई लावण्याचं ‘ प्रोसेस ‘ अगदी त्याचे दर ठरवतानाच्या घासाघिशीसकट पहाणं हा आमचा आनंद असायचा.घासाघीस खूप वेळ चालली तरी व्यवहार कधीच मोडायचा नाही. कारण कल्हई वाल्याच्या घरची चूल पेटणं ही त्याचीही गरज असायचीच.गरज दोन्ही बाजूना असल्यामुळेच ‘गरजवंताला अक्कल नसते’ ही म्हण या व्यवहारापुरती तरी नेहमीच खोटी ठरायची.कारण इथे दोन्ही गरजवंताना व्यवहार न मोडण्याची अक्कल असायचीच.

पाटा-वरवंटा, खलबत्ता, सूप,जातं, जाळीच्या दाराचं दूध ठेवायचं छोटंसं कडिकोयंड्याचं कपाट,फडताळं,शिफ्तर,शिंकाळं, ताटाळं, कपबशांचा भिंतीला टांगायचा स्टॅंड अशा आणि इतरही अनेक तेव्हाच्या स्वयंपाकघरातल्या अत्यावश्यक वस्तू आज कालबाह्य झाल्या असल्या तरी माझ्यासाठी मात्र त्यांच्या आठवणी आजही मोलाच्या आहेत…..

क्रमशः…..

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सहज आपलं सुचलं म्हणून…. ☆ प्रा. तुकाराम पाटील

श्री तुकाराम दादा पाटील

?  विविधा  ?

☆ सहज आपलं सुचलं म्हणून…. ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

अनुभवलेल्या प्रसंगांच्या कडू गोड बिया काळजात खोलवर रुजून बनले असते त्यांचे विशालवृक्ष आणि पुनः प्रत्ययाची सुमधुर फळ वारंवार चाखायला मिळाली  असती तर किती मजा आली असती जीवनात.

आणि महत्त्वाचं म्हणजे काही वेडंवाकडं करण्याला, वागण्याला कुणी धजावलच नसतं आयुष्यात. सर्वात महत्त्वाचा फायदा हाच झाला असता की घडवणारा व उपभोगणारा बांधील राहिला असता एकामेकाला. संपला असता जीवनकलह, मिटल्या असत्या व्यथा विवंचना उरला असता निखळ आनंद कायमचा . परस्परांना बांधून ठेवणारा, अतूट . पण करणार काय?  आता सुपीक काळीज ही उरलं नाही आणि प्रसंगांच्या बिया ही उगवणक्षम राहिलेल्या नाहीत. हा सुधारलेल्या गतीमन काळाचा महिमा, स्विकारावाच लागेल भविष्याचा कसलाही विचार न करता.  प्राक्तनान दिलेली भेट म्हणून पण भविष्याचा विचार करण्याआगोदर जे पेरलजात तेच उगवतं हे माहीत नव्हतका ? भौतिक सुखाची चटक लागलेले आपण जमानाच बदलला असं म्हणताना , तो कुणी बदललाय याच्यावर  कधी विचार तरी करतो का ? आपला सहभाग आहेच ना त्यात ? मग आपण मौन पाळून गप्प का ? जमाना बदलत रहातो. ती काळाची गरजही आहे.  पण जुनं जे हितकारक आहे.सुंदर आहे, ज्याच्यातून ऐश्वर्याची उंची मोजली जाते. जे सुखकारक असून परमानंद देते. जे गुण आणि अगाध आहे , माणसाला  माणसात ठेवण्यासाठी आवश्यक आहे ते टिकवण्यासाठी आपण काय केलं. की त्याची मोडतोड करण्याला हातभार लावण्याचाच अपराध केला.हे नाहीच तपासलं कधी. कारण आपण मनाचे मिंधे. सुखाना लाचावलेले. थोडेका होइना पण अपराधी आहोतच ना.

केलेला अपराध मान्य करायलाही मनाचा मोठेपणा असायलाच हवा. आपलं चुकत कुठं हे सगळ्यांनाच माहिती असतं. पण ते मान्यकरण्याची हिंमतच हरवली आहे आपल्यातली. मग उगीच कशाला दूस-याच्या नावावर बील फाडायची. माणसाला स्वत:चा टेंभा   मिरवण्याची जुनीच खोड आहे . त्यामुळे काय-काय घडलंय यांचे अनेक दाखले पुराणांन आणि इतिहासान नोंदवून ठेवले आहेत. ते वाचून  शहाणपण शिकेल तर तो माणूस कसला. कारण तो सजीवांच्यातला सर्वश्रेष्ठ जीव आहे, हे त्याला माहीत आहे. म्हणून  “मी करीन तीच पूर्व ” ही त्यांची घमेंड. तेवढ्याच तकलादू बळावर त्यान निसर्ग नियमांना बासनात गुंडाळून ठेवलं . त्यांच्यावर आक्रमण करत आपल्याला हवे तसे बदल घडवण्याचा चंग बांधला आणि टाकला बदलून जमाना आपल्या मर्जीप्रमाण. मग  बदलाचे परिणाम भोगताना आता काय म्हणून गळा काढून रड  मांडायचं.  हे सारं करताना आपल्या पेक्षाही एक वरचढ शक्ती या विश्वात आहे हेच आपण सोईस्कर रित्या विसरलोय . जग नियंत्यान घालून दिलेले आणि अनादी अनंत काळापासून चालत आलेले नियम पाळायला नकोतका? ते मोडले,की   गालफाड सुजेपर्यंत पडत जाणा-या थपडा  सोसाव्या लागतात. सध्या आपण हेच अनुभवत नाही काय ? तशा त्या पुढेही वाढतच रहाणार आहेत. निदान हे तरी लक्षात घेऊन पावलं उचलली जावीत हे समजायला हवं माणसाला.

 

© श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares