मराठी साहित्य – विविधा ☆ नकारात्मकतेची कृष्णछाया..! ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ नकारात्मकतेची कृष्णछाया..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

भडिमार..!नकारात्मकता हाच स्थायिभाव असलेला एक शब्द.एखाद्या कृतीचा हानिकारक परिणाम अधोरेखित करणारा हा शब्द. कोणत्याही गोष्टीचा अविरत ओघ,सातत्याने घडणारी क्रिया, ऐकणाऱ्याला उसंत न देता भान हरपून ऐकवलं जाणारं बरंच कांही यापैकी कशातही नकारात्मकता असेल तर त्याचे अचूक वर्णन करायला ‘भडिमार’ या शब्दाला पर्याय नाहीच.पण याच प्रत्येक बाबतीत जर सकारात्मकता असेल,तर त्याचे चपखल वर्णन करायला मात्र जेव्हा ‘भडिमार’हा शब्द कुचकामी ठरतो आणि तेव्हा इतर अनेक सुंदर शब्द नेमके दिमतीला हजर होतात.

पाऊस पडण्याची एक साधी घटना.ऊन-पावसाच्या खेळातल्या हलक्या सरी असतील तर तो पाऊस ‘रिमझीम’ पाऊस असतो. जीवघेण्या कडक उन्हाने तावून सुलाखून निघालेल्या धरणीला सुखावणारा आणि त्रस्त जीवाला शांतवणारा पाऊस अथक जोरदार पडणारा असला तरी तो पावसाचा भडिमार नसतो तर  ‘वर्षाव’ असतो.पण तोच पाऊस जर जगणं उध्वस्त करणारा, जीव नकोसा करणारा,जोरदार वाऱ्याच्या साथीनं तांडव करीत प्रचंड झाडांनाही उपटून फेकून देत घरांची छपरं उडवीत भिंती उध्वस्त करणारा असेल तर मात्र तो पाऊस टपोऱ्या थेंबांचा भडिमार करणारा विध्वंसकच असतो.

मुलांना प्रेमानं समजून सांगत त्यांना योग्य वळण लावणं आणि धाक दाखवून त्याना  सक्तीने शिस्त लावू पहाणं यात उद्देश एकच असतो पण त्यांचे परिणाम मात्र परस्परविरोधी..!प्रेमाने समजावणं मुलांना आश्वस्त करत योग्य मार्ग दाखवणारं असतं तर धाक दाखवणारा शब्दांचा भडिमार मुलांच्या मनात भिती तरी निर्माण करतो नाहीतर तिरस्कार तरी.

परस्परांना समजून घेत सामंजस्याने एक पाऊल मागे घेण्याची तयारी साध्या साध्या गोष्टीत लपलेला आनंदाचा खजिना खुला करते,तर मी म्हणेन तीच पूर्वदिशा हा हेकेखोरपणा कर्कश्श बोचऱ्या शब्दांचा भडिमार करीत नात्यांची वीण उसवत असतो.

भडिमाराची अनेक रुपे असतात. भडिमार प्रश्नांचा असतो,अपशब्दी शिव्यांचा असतो,कडवट डोस वाटावेत अशा उपदेशांचा असतो,अनाहूत सल्ल्यांचा असतो,आग्रही जाहिरातींचा असतो, कोणत्याही निवडणूकांच्या बाजारातल्या खोट्या आश्वासनांचाही असतो.जिथं जिथं ज्या ज्या रुपात तो असतो,त्यात नकारात्मकताच ठासून भरलेली दिसेल.सकारात्मकता असेल तिथे भडिमार असूच शकत नाही. उत्स्फुर्त प्रतिसादाचं प्रतिक म्हणून वाजवल्या जाणाऱ्या टाळ्यांचा प्रचंड ‘कडकडाट’ असतो.भडिमार नव्हे.एखाद्या चमकदार यशाबद्दल चारही दिशेने होत असतो तो कौतुकाचा वर्षाव असतो, कौतुकाचा भडिमार नव्हे.उत्स्फुर्त प्रतिसाद,कौतुकाचा वर्षाव,यात असा प्रसन्नतेचा उत्साहवर्धक प्रकाश असतो आणि भडिमाराच्या अंगांगात मात्र अंधाऱ्या नकात्मकतेच्या कृष्णाछायाच..!!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चि म टा ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

⭐  चि म टा ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“आई s s s गं ! किती जोरात चिमटा काढलास !”

काय मंडळी, आठवतंय का तुम्हांला उद्देशून कोणीतरी किंवा तुम्ही कोणाला तरी उद्देशून हे असं म्हटल्याचं ? माझ्या पिढीतील मंडळींना हे नक्कीच आठवत असणार ! कारण त्या काळी मुलं मुली शाळेत किंवा घरी, सारे खेळ एकत्रच खेळत होती. मुला मुलींची शाळा वेगवेगळी, ही कन्सेप्ट खूपच नंतरची. एखाद्या मित्राशी किंवा मैत्रिणीशी खेळतांना काही कारणाने भांडण झालं, तर त्याची परिणीती फार तर फार दुसऱ्याला चिमटा काढण्यात व्हायची. अगदीच तो किंवा ती द्वाड असेल तर चिमट्या बरोबरच दुसऱ्याला बोचकरण्यात ! आत्ताच्या सारखी पाचवी सहावीतली मुलं, आपापसातल्या भांडणातून एकमेकांवर वर्गात चाकू हल्ला करण्यापर्यंत, तेंव्हाच्या मुलांची मानसिकता कधीच गेली नव्हती ! कालाय तस्मै नमः! असो !

तर असा हा चिमटा ! ज्याचा अनुभव आपण आपल्या लहानपणी कोणाकडून तरी घेतला असेल किंवा तसा अनुभव दुसऱ्या कोणाला तरी नक्कीच दिला असेल ! अगदीच काही नाही, तर आठवा शाळेत कधीतरी “गुरुजींनी” तुम्हांला “घरचा अभ्यास” पूर्ण न झाल्याने दंडाला काढलेला चिमटा ! तो “गुरुजींनी” काढलेला चिमटा एवढा खतरनाक असायचा की दुसऱ्या दिवशी सुद्धा ती चिमट्याची जागा ठुसठुसायची आणि काळी निळी पडायची ! आणि ही गोष्ट घरी कळली की दुसरा दंड पण घरच्या वडीलधाऱ्या लोकांकडून काळा निळा व्हायचा !  हल्लीच्या “सरांना” किंवा “मॅडमना” कुठल्याही यत्तेच्या मुलांना हात लावून शिक्षा करणे तर सोडाच, उंच आवाजात ओरडायची पण चोरी ! कारण उद्या त्या मुलांच्या “मॉम किंवा डॅडने” “प्रिन्सिपॉलकडे” तक्रार केली, तर “सरांना” किंवा “मॅडमला” स्वतःची मुश्किलीने मिळवलेली नोकरी गमवायची भीती ! तेंव्हाच्या “गुरुजींना” सगळ्याच मुलांच्या घरून, त्यांना वाटेल तसा त्यांच्या दोन्ही हातांचा, डस्टर, पट्टी किंवा छडी यांचा अनिर्बंध वापर करायचा अलिखित परवाना, “गुरुजी” म्हणून शाळेत नोकरीला लागतांनाच मिळालेला असायचा ! आणि या पैकी कुठल्याही गोष्टीचा यथेच्छ वापर करायला ते “गुरुजी” त्या काळी मागे पुढे पहात नसत.

 तारेवर ओले कपडे वाळत घालतांना ते वाऱ्याने पडू नयेत म्हणून, “हा चिमटा तुटला, जरा दुसरा दे !” असं आपण घरातल्या कोणाला म्हटल्याच बघा आठवतंय का ? (कधी अशी काम केली असतील तर ?) माझ्या लहानपणी लाकडाचे स्प्रिंग लावलेले चिमटे, अशा तारेवरच्या सुकणाऱ्या कपड्यांना लावायची पद्धत होती !  ते चिमटे तसे फार नाजूक असायचे. आता तुम्ही म्हणाल नाजूक चिमटे ? म्हणजे काय बुवा ! तर तुम्हांला लगेच कळणाऱ्या भाषेत सांगायचं तर, तरुणपणी जर तुम्ही प्रेमात पडला असाल(च)?आणि कधीकाळी तुमच्या प्रेयसीने तुम्हांला लाडात येवून प्रेमाने नाजूक चिमटा काढला असेल, तर तो आठवा, तेवढं नाजूक ! हे उदाहरणं लगेच पटलं ना ? ?पण ज्यांच्या नशिबात कांद्या पोह्याचा कार्यक्रम होऊन गळ्यात वरमाला पडली असेल त्यांनी आपल्या लग्नाचं फक्त पाहिलं वर्ष आठवून बघा ! तर लग्ना नंतरच्या पहिल्या वर्षातच बरं का, असा नाजूक चिमट्याचा आपल्याला हवा हवासा प्रसाद, आपापल्या बायकोने आपल्याला दिल्याचं बघा आठवतंय का ! मी फक्त पहिल्या वर्षातच असं म्हटलं, त्याला कारण पण तसं ठोस आहे. कसं असत ना, लग्ना नंतरचे नव्या नवलाईचे दिवस संपल्यावर, उरलेल्या वैवाहिक जीवनात बायकोकडून वाचिक चिमटे ऐकायची सवय नवरे मंडळींना करून घ्यावी लागते ! पण जसं जशी संसाराची गाडी पुढे जाते, तसं तसा या वाचिक चिमट्याचा त्रास, त्याची स्प्रिंग लूज झाल्यामुळे असेल कदाचित, पण नवरोबांच्या अंगावळणी पडतो एवढे मात्र खरे !?त्यामुळे अशा वाचिक चिमट्याचा पुढे पुढे म्हणावा तसा त्रास होतं नाही, नसावा !

तर मंडळी, पुढे पुढे हे त्या काळी वापरात असलेले लाकडी चिमटे जाऊन, त्याची जागा तारेच्या चिमट्याने घेतली.  तारेच्या म्हणजे, आतून तार आणि बाहेरून प्लास्टिकचे आवरण ! पण या चिमट्याचा एक ड्रॉबॅक होता. तो म्हणजे आतल्या तारेवरचे प्लास्टिकचे आवरण निघाले की त्याच्या आतली तार गंजत असे आणि त्यामुळे तो ओल्या कपड्यावर लावताच त्यावर डाग पडत असे. नंतर नंतर हे चिमटे पण वापरातून हद्दपार झाले आणि त्याची जागा निव्वळ प्लास्टिकने बनलेल्या, लहान मोठ्या आकाराच्या चिमट्याने घेतली, जी आज तागायत चालू आहे. माझ्या मते या पुढे सुद्धा तीच पद्धत अनंत काळ चालू राहील, हे आपण स्वतःच स्वतःला चिमटा न काढता मान्य कराल यात शंका नाही !?

मागे मी एका लेखात म्हटल्या प्रमाणे, विषय कुठलाही असला तरी त्यात नेते मंडळींचा उल्लेख असल्या शिवाय, तो लेख पूर्ण झाल्याच समाधान मला तरी मिळत नाही ! ?आता तुम्ही म्हणाल चिमट्याचा आणि नेते मंडळींचा संबंध काय ? तर तो असा, की पूर्वी जी खरोखरची विद्वान नेते मंडळी होऊन गेली, ती आपल्या विद्वताप्रचूर भाषणातून, आपापल्या विरोधी पक्षाच्या नेते मंडळींना चांगलेच शाब्दिक चिमटे काढीत ! तो तसा चिमट्याचा शाब्दिक मार, तेंव्हाच्या नेत्यांची कातडी गेंड्याची नसल्यामुळे, त्या काळी त्यांच्या खरोखरचं जिव्हारी लागतं असे ! गेले ते दिवस आणि गेले ते विद्वान नेते !

आपली मराठी भाषा कोसा कोसावर बदलते याचा अनुभव आपण कधी ना कधी घेतला असेलच. “अरे बापरे, पाणी उकळलं वाटतं ! जरा तो चिमटा बघू !” आता या वाक्यात आलेला चिमटा हा कोणत्या प्रकारात मोडतो हे आपल्या लगेच लक्षात यायला हरकत नाही ! म्हणजे काही महिला मंडळी ज्याला “सांडशी” किंवा “गावी” किंवा “पकड” म्हणतात त्यालाच काही काही महिला चिमटा असं पण म्हणतात !

“तू तुझ्या पोटाला कधी चिमटा काढून जगला आहेस का ?” असा प्रश्न आपण जर का आजच्या तरुण पिढीतल्या मुलांना किंवा मुलींना विचारला, तर ९९% तरुणाईच उत्तर असेल “मी कशाला माझ्याच पोटाला चिमटा काढायचा ? दुखेल ना मला ! पण हां, तुम्ही सांगत असाल तर मी दुसऱ्या कोणाच्या तरी पोटाला नक्कीच चिमटा काढू शकतो हं!” या अशा उत्तरावर, आपण माझ्या पिढीतील असाल तर नक्कीच खरोखरचा कपाळाला हात लावाल !

शेवटी, आपल्या सगळ्यांवरच या पुढे आपापल्या पोटाला कधीही चिमटा न काढता, सुखी आणि समाधानी आयुष्य व्यतित करायला मिळू दे, हीच त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि हे चिमटा पुराण आणखी चिमटे न काढता संपवतो !

ता. क. – वरील पैकी कुठल्याही “चिमट्याचा” कोणाला वैयक्तिक त्रास झाल्यास, त्याला लेखक जबाबदार नाही !

© श्री प्रमोद वामन वर्तक

०९-११-२०२१

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खिडकी… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

?विविधा ?

☆ खिडकी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

रुक्मिणी तिच्या सखीला सांगते,” ते आले,मी त्यांना पाहिलं, बरं का,.सर्वांच्या आधी मी त्यांना पाहीलं”. किती आनंद झाला होता रुक्मिणीला.स्वयंवर नाटकांतील हा प्रवेश.

माझाही अनुभव काही फारसा वेगळा नाही. आमच्या घराच्या खिडकीतूनच मी त्याला प्रथम पाहीलं.

आजूबाजूच्या लोकांकडून तो फारच देखणा आहे, रूबाबदार आहे,असं बरंच काही कानावर आलं होतं पण त्यादिवशी आमच्या दिवाणखान्याच्या खिडकीतून मला त्याचं दर्शन घडलं.ऊंचापुरा बांधा, गुलाबी गौर वर्ण,सोनेरी छटा असलेले कुरळे केस,अगदी उदयाचलीचा अरूणच! मन माझे मोहून गेले!

त्याच वेळी अंतर्शालेय नाट्यस्पर्धेत आमच्या शाळेने ‘ए क होता म्हातारा’ हे मो.ग.रांगणेकरांचे नाटक सादर केले होते आणि त्यांतील “ये झणि ये रे ये रे ये रे ये रे माघारी”हेच पद एकसारखे  गुणगुणण्याचा मला नाद लागला होता.गाता गाता खिडकीतून सहज बाहेर पहायचे आणि अहो आश्चर्य तो आलेला असायचाकीहो!

अग अग  खिडकीबाई आमच्या मूक प्रेमाची तू पहीली साक्षीदार!

काय झालं असतं, घराला खिडकीच नसती तर? कारागृहच! खिडकी पलिकडचं जग किती सुंदर आहे.

आमच्या घरांतून रोज सूर्योदय दिसतो,ती गुलाबी पहाट पाहतांना कसं अगदी प्रसन्न वाटतं,आणि मग आठवतं ते देसकारातलं कृष्णाचं पद,”प्रिये पहा! रात्रीचा समय सरुनी होत उषःकाल हा”!

काही घरांतून सूर्यास्त दिसत असेल, तलावाकाठी असलेल्या घरांना नौका विहार, पक्ष्यांचे उडणारे थवे, तलावाचे निळेशार पाणी अशा सृष्टी सौंदर्याचा आस्वाद घेता येत असेल. काही  घरे भर वस्तीत रस्त्यावर असतात. रस्त्यावरची वर्दळ, वाहनांचा आवाज,फेरीवाल्यांच्या विक्षिप्त आरोळ्या हेही खिडकीपलिकडचे जग अनुभवणे मजेचेच असते.

मुंबईला मरीनड्राईव्हवर फिरत असतांना दिसतात धनाढ्य लोकांची समुद्राच्या विरुद्ध दिशेला असलेली घरे. घरांना ग्लास वाॅल आणि मोठमोठाल्या फ्रेन्च विंडोज! कांचेच्या पलीकडून उसळणार्‍या लाटा पाहातांना, समुद्राची गाज ऐकतांना ह्या रहिवाश्यांना मिळणारा आनंद काय वर्णावा?

मला आठवतं आम्ही काश्मीरला पेहेलगाम याठिकाणी गेलो होतो.आमच्या हाॅटेलच्या समोरूनच लिडार नदी वाहत होती. तिची अखंड खळखळ, शुभ्र फेसाळलेले पाणी खिडकीतून पाहताना डोळ्याचे पारणे फिटत होते जणू.

अलिकडे टी.व्हीवर कसली तरी जाहिरात दाखवतात.त्याचे जिंगल आहे” काय काय दाखवते ही खिडकी”

मलाही तेच वाटतंकाय काय दाखवते ही खिडकी?

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ काळजी हवीच… पण..! ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ काळजी हवीच… पण..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

काळजातून उमटते ती काळजी.ती वाटत असते. दडपणापोटी निर्माण होते तीही काळजीच.पण ती नकारात्मक छटा असणारी.मनाला लागून रहाणारी आणि मग हळूहळू मन:स्वास्थ्यच पोखरु लागणारी.काळजातली काळजी त्या त्या प्रश्नाचं उत्तर शोधून ते प्रश्न निर्माण करणाऱ्या कारणांचं निराकरण करण्यासाठी आवश्यकच असते आणि मदतरुपही ठरते.पोखरणारी काळजी मात्र उत्तरंच दिसू नयेत इतका मनातला अंधार वाढवत रहाते आणि त्या अंधारात स्वत: मात्र ठाण मांडून बसून रहाते.या उलट काळजातली काळजी स्वत:च प्रकाश होऊन मनातली रुखरुख कमी करणाऱ्या प्रकाशवाटेचा मार्ग दाखवते.

काळजी निर्माण करणारी कारणं असंख्य आणि त्या कारणांचे प्रकारही वेगवेगळे.इथे समतोल मनाने परिस्थितीचा विचार करुन योग्य निर्णय घेणे आणि ते अंमलात आणणे या प्रोसेसमधे ‘वाटणारी काळजी’ सहाय्यभूत ठरते,आणि ‘पोखरणारी काळजी’ अडसर निर्माण करते.त्यामुळे कितीही बिकट परिस्थिती असली,तरी काळजी करण्यात वेळेचा अपव्यय न करता काळजीपूर्वक निर्णय घेणेच हितावह ठरते.

काळजी वाटायला लावणारी अनेक कारणे बऱ्याचदा अपरिहार्य असतात.वृध्दांच्या बाबतीत आणि विशेषत: त्यांच्या एकाकी वृध्दापकाळात निर्माण होणारे प्रश्न काळजी इतकेच विवंचना वाढवणारेच असतात. अशावेळी नेमका प्रश्न समजून घेऊन एखादा सक्रिय आपुलकीचा, प्रेमाचा,आधाराचा स्पर्शही त्या प्रश्नांची तिव्रता कितीतरी पटीने कमी करु शकतो.त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सपोर्ट सिस्टीमचा आपणही एक भाग होण्यासाठी आवश्यक आहे फक्त थोडी माणूसकी आणि सहृदयता.

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! धूर, उग्र वास आणि डिवोर्स ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? धूर, उग्र वास आणि डिवोर्स ! ??

“पंत हा तुमचा पेपर !”

“अगं सुनबाई आज तू कशी काय आलीस, नेहमी मोरू येतो पेपर द्यायला !”

“पंत मीच यांना म्हटलं, आज मी पेपर देऊन येते.”

“बरं बरं, पण त्या मागे काही खास कारण असणारच तुझं, होय ना ?”

“बरोब्बर ओळखलत पंत, नेहमी तुम्ही यांना सल्ले देता नां, आज मला तुमचा सल्ला हवाय.”

“अगं मी कसले सल्ले देणार, काहीतरी अनुभवाच्या जोरावर बोलतो इतकंच ! बरं पण मला सांग मोरू बरा आहे ना?”

“त्यांना काय धाड भरल्ये ? मी पेपर नेवून देते म्हटल्यावर परत डोक्यावर पांघरूण घेऊन आडवे झालेत!”

“असू दे गं, दमला असेल तो!”

“त्यांना दमायला काय झालय, सगळे नवीन शौक व्यवस्थित चालू आहेत त्यांचे घरातल्या घरात, गुपचूप !”

“मोऱ्याचे कसले नवीन शौक ? मला काही कळेल असं बोलशील का जरा ?”

“पंत, मला नक्की खात्री आहे, यांना पण त्या कोण आर्यन का फार्यन सारख, बॉलिवूडला लागलेलं नको ते व्यसन लागलंय!”

“काय बोलतेस काय तू ? मोऱ्या आणि ड्रग्जच्या आहारी ?”

“हो नां, म्हणून तर मला डिवोर्स हवाय यांच्या पासून आणि तो कसा मिळवायचा हेच विचारायला मी तुमचा पेपर परत करायच्या निमित्ताने तुम्हाला भेटायला आले !”

“अगं अशी घायकुतीला येऊ नकोस, मला जरा नीट सांगशील का, तुला असं वाटलंच कसं की मोऱ्या ड्रग्जच्या आहारी गेलाय म्हणून ?”

“अहो पंत, तुम्हाला म्हूणन सांगते, कोणाला सांगू नका, हे हल्ली अंघोळ करून बाहेर आले, की रोज बेडरूम मधे जातात आणि आतून कडी लावून अर्ध्या पाऊण तासाने बाहेर येतात !”

“यावरून तू डायरेक्ट मोऱ्या ड्रग्ज घेतो या निष्कर्षांवर येवून, एकदम डिवोर्सची भाषा करायला लागलीस ?”

“पंत एवढच नाही, हे बाहेर आले की बेडरूम मधून एक उग्र वास आणि धूर जाणवतो मला !”

“मग त्याला तू विचारलंस का नाही, हा धूर आणि उग्र वास कसला येतोय म्हणून ?”

“विचारलं ना मी पंत, मी सोडते की काय त्यांना !”

“मग काय म्हणाला मोऱ्या ?”

“मला म्हणाले, सध्या मी सर्दीने हैराण झालोय आणि त्यावर एक घरगुती उपाय करतोय म्हणून !”

“अगं मग तसंच असेल ना, उगाच तू त्याला ड्रग्जच व्यसन लागलंय….”

“पण पंत, तो उपाय माझ्यासमोर करायला काय हरकत आहे यांना ? बेडरूम मधे बसून कडया लावून कशाला करायचा ? ते काही नाही मला डिवोर्स पाहिजे म्हणजे पाहिजे!”

“ठीक आहे, ठीक आहे, तुला डिवोर्स हवाय ना, मी तुला मदत करीन, तू काही काळजी करू नकोस, ok !”

“पंत मला वाटलंच होतं तुम्ही मला मदत कराल म्हणून.”

“हो, पण त्याच्या आधी मला सांग, मोऱ्याला पगार किती मिळतो महिन्याला ?”

“तसं बघा, सगळं हप्ते, टॅक्स जाऊन तीस एक हजार मिळतो !”

“आणि तो सगळा तो तुझ्या हातात आणून देतो की त्याच्या जवळच ठेवतो ?”

“अहो हे पगार झाल्या झाल्या लगेच माझ्या हातात देतात मी तो देवा समोर ठेवून नंतर माझ्याकडेच ठेवते बघा पंत !”

“आणि मोऱ्याला खर्चाला….”

“ते मागतात तसे मी त्यांना देते की !”

“मग आता तू निश्चिन्त मनाने घरी जा, कसलीच काळजी करू नकोस !”

“पण पंत माझ्या डिवोर्सच काय ?”

“अगं तुझ्या मोऱ्याला मी अर्ध्या चड्डीत असल्या पासून ओळखतोय! त्याला सुपारीच्या खांडाच पण व्यसन नाही आणि आज एकदम तू ड्रग्ज…”

“पण पंत माणूस बदलतो मोठा झाल्यावर वाईट संगतीत, तसं काहीस…”

“अगं एक लक्षात घे, मोऱ्याचा पाच वर्षाचा पगार एकत्र केलास तरी त्यातून पाच ग्राम पण ड्रग्ज येणार नाहीत !”

“काय सांगताय पंत, तुम्हाला कसं कळलं ?”

“अगं पेपर मधे बातम्यातून कळते ना त्या ड्रग्जची किंमत, त्यामुळे तू डोक्यातून मोऱ्याच्या ड्रग्जच्या व्यसनाचं खूळ काढून टाक ! ती सगळी बड्या मशहूर पैशाने सगळी भौतिक सुख विकत घेणाऱ्या धेंडांची  व्यसन ! आपण निम्न मध्यमवर्गीय, महिन्याची तीस तारीख गाठता गाठता काय काय दिव्य करायला लागतात ते आपल्यालाच ठाऊक !”

“ते सगळं बरोबर पंत, पण मग त्या धुराच आणि उग्र वासाच काय ?”

“अगं कोकणातली ना तू, मग तुला सर्दी वरचा घरगुती उपाय माहित नाही ?”

“खरंच नाही माहित पंत !”

“अगं तो दीड शहाणा बेडरूम मध्ये ओव्याची धूम्रनलिका ओढत असणार, दुसरं काय !”

“धूम्रनलिका म्हणजे ?”

“अगं ओव्याची सिगरेट बनवून ओढत असणार आणि त्याचाच तुला उग्र वास आला असणार आणि धूर दिसला असणार, कळलं !”

“अग्गो बाई, किती वेंधळी मी, उगाच सुतावरून स्वर्ग गाठायला गेले ! धन्यवाद हं पंत, आज तुम्ही माझे डोळे उघडलेत ! आता मी या जन्मात डिवोर्सची भाषा करणार नाही ! येते पंत, नमस्कार करते !”

“अखंड सौभाग्यवती भव !”

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

२५-१०-२०२१

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मेंदू वापरा, नाहीतर विसरा…भाग 2 ☆ सुश्री मंगला जोगळेकर

?  विविधा  ?

☆ मेंदू वापरा, नाहीतर विसरा…भाग 1 ☆ सुश्री मंगला जोगळेकर ☆

(इतर काही बारीकसारीककाम करतानाही असे व्यायाम करता येऊ शकतात.)पासून पुढे

या दोघांनी सुचवलेले काही व्यायाम –

– आज रात्री उजव्या हातानं दात घासण्याऐवजी ते डाव्या हातानं घासून बघा. त्यानंतर तुम्हाला असं जाणवेल, की मेंदूला या क्रियेकडे लक्ष द्यावं लागलं, कारण हे काहीतरी रोजच्यापेक्षा वेगळं होतं, नवीन होतं.

– हातानं जेवण्याऐवजी कधी काट्यानं/चॉपस्टिक्स वापरून जेवा.

– जेवणात कधी न चाखलेल्या पदार्थाचा समावेश करा आणि त्यांचा आस्वाद घ्या.

– रोजच्या रस्त्यावर चालायला न जाता वेगळ्या मार्गानं जा.

– कुणाच्या घरी किंवा इतर कु ठे जाऊन आल्यावर त्या ठिकाणी जाण्याचा नकाशा कागदावर तयार करा.

– मनातल्या मनात छोटेमोठे गुणाकार, भागाकार करा. शक्यतो कॅल्क्युलेटर न वापरता हिशेब करा.

– टी.व्ही.वर बघत असलेल्या मालिके ची गोष्ट आपल्या शब्दात लिहा. गोष्टीचा पुढील भाग आपल्या शब्दात आधीच मांडा.

या सगळ्यातून मेंदू जागृत होऊन त्या क्रियेकडे लक्ष दिलं जाईल आणि त्यामुळे लक्षात राहाणंही आपोआप होईल. वर सांगितल्याप्रमाणे दर वेळी मेंदूचे व्यायाम आपल्याला न पचणारे, न रुचणारे करण्याची काहीच आवश्यकता नसते. ते आवडीचे असले तरच ते करावेसे वाटतील. जितक्या वेगवेगळ्या गोष्टी आपण शिकत जाऊ तितका मेंदू आपल्याला साथ देत जाईल, याचाही तुम्हाला अनुभव येईल. अर्थातच शिकण्याचं महत्त्व आपल्याला पटून त्यामध्ये आपलं मन घालायला पाहिजे हे साहजिकच आहे. तरीही कुठल्याही व्यायामांमुळे मेंदू विचाराधीन राहिला का? ताजंतवानं वाटलं का? हे मात्र जाणीवपूर्वक बघायला हवं.

एकाच प्रकारचे व्यायाम सदोदित करणाऱ्यांच्या मेंदूला पुरेसा व्यायाम मिळेलच असं नाही. उदा. जे शब्दकोडं तुम्ही दहा, पंधरा मिनिटांत सहज सोडवू शकाल, जे सोडवणं तुमच्या हातचा मळ असेल, त्यातून तुम्हाला झालाच तर अत्यल्प फायदा होईल. त्यामुळे एकाच वर्तमानपत्रातील शब्दकोडं पुरेसं आव्हानात्मक नसेल, तर दुसऱ्या वर्तमानपत्रातील कोडं सोडवा. ‘कोडीमास्टरां’ना कोडी सोडवण्याऐवजी स्वत:ची कोडी तयार करून एक वेगळंच आव्हान मिळेल. एकाच प्रकारची कोडी सतत सोडवण्याऐवजी वेगवेगळ्या प्रकारची कोडी सोडवणं केव्हाही चांगलं. त्यामुळे मेंदूच्या वेगवेगळ्या भागांना वेगवेगळी आव्हानं मिळतील. ‘सुडोकू’तून मिळणारं आव्हान शब्दकोड्याहून वेगळं असेल, तर बुद्धिबळातून, ब्रिज खेळण्यातून मिळणारं आव्हान आणखी वेगळं असेल. हल्ली वेगवेगळ्या कोड्यांसाठीची अ‍ॅप्स मोफत उपलब्ध असतात. त्यांचाही उपयोग करता येईल.

मेंदूला वेगवेगळे व्यायाम देऊन स्मरणशक्तीवर्धन करणाऱ्या ‘वेब पोर्टल्स’ची सुरुवात होऊन अमेरिकेत आता एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. याची सुरुवात विविध रुग्णालयांनी केलेल्या स्मरणवर्धन कार्यक्रमांतून झाली असं म्हणता येईल. ब्रेन एरोबिक्स, ब्रेन जिम अशा विविध कार्यक्रमांमधून स्मरणशक्तीच्या विषयाबाबत जागृती वाढण्याचं मोठं काम तिथे झालं आहे. परंतु आपल्याकडे हा विषय नवीन होता. आपली पार्श्वभूमी लक्षात घेऊन सगळ्यांना आवडतील, रुचतील असे मेंदूचे व्यायाम घ्यावेत अशी कल्पना मनात रुजली. डिमेंशियाला शक्य तेवढं दूर ठेवायला हवं हे उद्दिष्ट त्यापाठीमागे होतं. या विचारानं पुणे येथे २०१४ मध्ये राज्यातील बहुधा पहिला ‘मेमरी क्लब’ चालू करण्याची संधी मिळाली. आज पुण्यात बऱ्याच ठिकाणी असे क्लब सुरू आहेत. नाशिकमध्येही ते सुरु झाले आहेत. मेमरी क्लब्समध्ये आठवड्यातून एकदा एकत्र जमून मेंदूसाठी आनंददायी व्यायाम (एक्सरसाइज) घेतले जातात.

टाळेबंदीच्या काळात या क्लब्सनी व्हॉट्सअ‍ॅपवरून आपलं काम चालू ठेवलं. त्यावरून स्फूर्ती घेऊन असे अनेक ‘व्हॉट्सअ‍ॅप मेमरी क्लब’ स्थापन झाले. आज महाराष्ट्राच्या विविध भागांतील जवळपास २,००० व्यक्ती अशा क्लब्सशी जोडल्या गेल्या आहेत. क्लबमुळे होणारे अनेक फायदे सभासद नमूद करतात. त्यामधील प्रमुख फायदे असे आहेत- आत्मविश्वास वाढतो, मनामधील नको ते विचार बंद होतात, मेंदूला सतत खाद्य मिळतं, नावीन्यपूर्ण गोष्टी करण्याचा आनंद मिळतो, नवीन शिकणं होतं, नवीन ओळखी होतात, इत्यादी. बरेच सदस्य आपल्या ऐंशी वर्षांवरील पालकांनाही हे एक्सरसाइज सोडवण्यात सहभागी करून घेताना दिसतात. यातील काही जण तब्येत बरी नसतानाही एक्सरसाइज सोडवण्याचा आनंद घेतात. सहलीला गेल्यावर, घरात जेवणाच्या टेबलावर एक्सरसाइजच्या चर्चा रंगतात, असंही दिसतं.

हे क्लब्स वाढण्याचं एकमेव कारण म्हणजे ते चालवण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला. केवळ त्यांच्याच सहकार्यावर क्लब्सचं काम चालू आहे. खरंतर मेंदूचं आरोग्य राखण्यासाठी सुरू झालेली ही एक चळवळ आहे. या पुढाकारातून ‘एक्सरसाइजेस’चं तयार झालेलं वैविध्य केवळ अनोखं म्हणायला हवं. अर्थात हे काम पुढे जायचं तर उत्साही मंडळींची कार्यकर्ते आणि सदस्य म्हणून आवश्यकता आहेच. मेंदूला कायम ‘फॉर्मात’ ठेवण्यासाठी त्याला नियमित खाद्य देणं अतिशय महत्त्वाचं आहे. वर्षभरात महिनाभर व्यायाम केला तर जसा शरीराला व्यायामाचा फायदा होणार नाही, तसंच वर्षभरातून चार आठवडे मेंदूला व्यायाम देऊनही तो पुरेसा होणार नाही. चार-आठ दिवसांत मेंदूला ‘सुपर पॉवरफुल’ करणारी पुस्तकं, गोळ्या आणि इतर कार्यक्रमांचा फोलपणा यावरुन लक्षात यावा. मेंदूचं कुतूहल वाढवून त्याला जागृत ठेवणं हा नित्यक्रमाचाच भाग व्हायला हवा.

मग करायची का सुरुवात? आजच्या मेंदूच्या अभ्यासासाठी काही सोपे प्रश्न खाली देते आहे. ते जरूर सोडवून पाहा.

‘च’ आणि ‘क’ ही दोन्ही अक्षरं असलेले शब्द लिहा. (उदा. चूक, चकवा)

आकाश, आभाळ या शब्दांशी नातं सांगणारे किती शब्द तुम्ही सांगू शकाल?

‘प्यार’ हा शब्द असलेल्या किती हिंदी चित्रपटांची नावं तुम्हाला आठवतात?

तुमचा आवडता एक खेळ, गोष्ट, वस्तू यांपैकी कशाचीही तुमच्या परदेशातील नातीला तुम्ही कशी ओळख करून द्याल?

तुम्हाला आठवतेय का लहानपणी वापरात असलेली जुन्या कपड्यांमधून बेतलेली पिशवी? बाहेर जाताना ती पटकन  खिशात कोंबली तर कधीही तिचा वापर करता यायचा. आता आधुनिक वातावरणात पिशवी हा शब्दही हद्दपार झाला आणि तिची ‘डिझाइनर बॅग’ झाली. या पिशवीचा पूर्वीपासून आतापर्यंतचा प्रवास शब्दांत टिपा; नाहीतर तिचं स्थित्यंतर चित्रांमध्ये पकडा. शाळेतल्या निबंधांचे विषय असायचे तसं ‘पिशवीचं आत्मवृत्त’चं जणू!

घरात वा मित्रमंडळींमध्ये असे प्रश्न तुम्हीच तयार करूनही एकमेकांना सोडवायला सांगू शकाल. अंतिमत: मेंदू तल्लख राहाणं हाच आपला उद्देश आहे. आणि त्यासाठी प्रयत्न करणं तुमच्याच हातात आहे.

© सुश्री मंगला जोगळेकर

 ≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मेंदू वापरा, नाहीतर विसरा…भाग 1 ☆ सुश्री मंगला जोगळेकर

?  विविधा  ?

☆ मेंदू वापरा, नाहीतर विसरा…भाग 1 ☆ सुश्री मंगला जोगळेकर ☆

जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्याला जग कसं अगदी आश्चर्यांनी भरलेलं दिसतं, जगाकडे पाहाण्याची आपली दृष्टी कायमच विस्मयजनक असते.

मेंदू वापरला नाही तर तो गंजतो, हे आता सिद्ध झालेलं आहे. म्हणूनच  मेंदूला सतत कामाला लावायला हवं. रोजच्या रोज, घरच्या घरी करता येणाऱ्या गोष्टी, कोडी यांनीही ते करता येतं. मेंदूला कृतिशील ठेवण्यासाठी जगभरात विविध ‘वेब पोर्टल्स’तर आहेत याशिवाय ब्रेन एरोबिक्स, ब्रेन जिमही सुरूझालीत. विविध अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. पुण्यासह इतरही काही ठिकाणी मेमरी क्लब सुरू करण्यात आले आहेत.

डॉडेव्हिड स्नोडन हे अमेरिकेच्या केन्टकी विद्यापीठात काम करतात. १९८६ पासून ते एका महत्त्वपूर्ण अभ्यासात गुंतले आहेत. हा अभ्यास मिनीसोटा राज्यातील आडवळणाच्या गावात चर्चमध्ये काम करणाऱ्या नन्सचा आहे. यातील बहुतेक नन्स नव्वदीच्या घरात पोहोचल्या आहेत, वा होत्या. त्यांचा अभ्यास करण्याचं कारण तुमच्या लक्षात आलंच असेल; ते म्हणजे त्यांचं असाधारण आयुष्यमान. या सर्वेक्षणाद्वारे आतापर्यंत जवळजवळ ७०० नन्सचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यामध्ये असं दिसून आलं, की त्यांच्या उत्साही दीर्घायुष्याचं रहस्य त्या मेंदूला देत असलेल्या व्यायामात आहे. त्यांच्या चर्चमध्ये प्रश्नमंजूषा, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा, इत्यादी कार्यक्रम आय़ोजित केले जातात. आपापले छंद जोपासणं, शब्दकोडी सोडवणं यालाही प्रोत्साहन दिलं जातं. याशिवाय सर्वजणी चर्चमध्ये आपली नेमून दिलेली कामं मोठ्या वयातही करतात.

या अभ्यासासाठी आतापर्यंत शंभराहून जास्त नन्सनी आपले मेंदू दान दिले. त्यांच्या मृत्यूनंतर केलेल्या पाहणीमध्ये त्यांच्या मेंदूच्या पेशींची मुळं (म्हणजे डेंड्राइट आणि अ‍ॅक्झान) आक्रसलेली तर दिसली नाहीतच. परंतु त्यांनी मेंदूच्या आत दळणवळणाचे नवीन मार्ग प्रस्थापित केलेले दिसले. याशिवाय निकामी झालेल्या मार्गांवर त्यांची जागा घेणारे पर्यायी मार्गही तयार झालेले आढळून आले. यावरून मेंदूच्या व्यायामांमुळे, त्याला आव्हान दिल्यामुळे डेंड्राइट्सची चांगली वाढ होते आणि पेशींमधील संदेशवहनाची क्षमता वाढते, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मृत्यूनंतर झालेल्या मेंदूच्या पाहणीमध्ये यांपैकी कित्येक नन्सना अल्झायमर्स झालेला होता असं आढळलं. परंतु वर्षानुवर्षं मेंदूला मिळणाऱ्या व्यायामांमुळे रोजच्या जीवनावर स्मृतिभ्रंशाचा कुठलाही दृश्य परिणाम न होता त्या आपलं आयुष्य निश्चिंतपणे जग़ू शकल्या. ही खूपच मोठी आश्चर्याची बाब आहे. या निरीक्षणाचे तरंग जगभर उमटले. त्याची चर्चा सुरू झाली.

ज्यांना शिक्षणाची आवड आहे, जे पदवीधर आहेत, जे बुद्धीला खाद्य देणाऱ्या गोष्टींमध्ये रस घेतात, वाचन, लेखन, आवडीच्या विषयांवर चर्चा, माहितीपूर्ण कार्यक्रम बघणं, नवीन भाषा शिकणं इत्यादी तऱ्हेतऱ्हेच्या प्रकारांनी ‘मेंदूचा जागर’ घडवून आणतात, त्यांच्यामध्ये ‘डिमेंशिया’ होण्याची शक्यता थोडीफार कमी होते.  न्यूयॉर्कमध्ये पंचाहत्तर वर्षांपेक्षा वयानं अधिक असलेल्या लोकांच्या अभ्यासातून असं दिसलं, की जी मंडळी बुद्धिबळ, सोंगट्यांसारखे खेळ नियमितपणे- म्हणजे आठवड्यातून चार वेळा तरी खेळतात, विविध प्रकारांनी मेंदूला जागृत ठेवतात, त्यांच्यात डिमेंशिया होण्याची शक्यता कमी होते. चीनमधल्या अभ्यासातूनही असं दिसून आलं, की जी मंडळी मोठ्या वयातही आव्हानात्मक गोष्टी करणं चालू ठेवतात त्यांच्या बुद्धीची झीज कमी प्रमाणात होते.

जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्याला जग कसं अगदी आश्चर्यांनी भरलेलं दिसतं, जगाकडे पाहाण्याची आपली दृष्टी कायमच विस्मयजनक असते. रोजच्या रोज नवीन आव्हानं आपल्या मेंदूला ताजंतवानं ठेवतात. नित्य नवीन शिकल्यामुळे मेंदू कृतीशील राहातो. त्यातील बदलांकडे बघून शास्त्रज्ञांना पेशींच्या नवनिर्मितीचा दाखला मिळत जातो. औत्स्युक्य टिकवल्यामुळे वयानुसार होणारी झीज घडत असतानादेखील, आपली ताकद राखून ठेवण्याचा मेंदू प्रयत्न करतो. परंतु असंही दिसतं, की मेंदूला अनाठायी आराम दिल्यामुळे, निवृत्तीनंतर येणाऱ्या सुस्तीमुळे, जीवनात रस घेणं थांबवल्यामुळेही मेंदू विसावतो. आपला स्वभावधर्म सोडून, स्मरण ठेवण्याचं आपल्याला नेमून दिलेलं काम करण्यात तो कुचराई करायला लागतो. त्याचाच परिणाम म्हणून आपलं विस्मरण वाढतं. विस्मरणाऐवजी स्मरणाची गाडी द्रुतगतीच्या मार्गानं वळवण्यासाठी ‘आराम हराम हैं’ हा मंत्र लक्षात ठेवा. मेंदूला वापरायला शिका. ‘मला काम द्या, मी कामाचा भुकेला आहे,’ असं सांगणारं मेंदूशिवाय दुसरं कोणी या जगात भेटणार नाही, याबद्दल सर्वांचं एकमत व्हावं! या वृत्तीमुळे मेंदूच्या कक्षा आपण कितीही रुंदावू शकतो.

‘ड्युक युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर’मधील प्रोफेसर डॉ. लॉरेन्स कॅट्झ यांनी नावीन्यातून मेंदूला जागवा, असा संदेश दिला. आपण ज्या गोष्टी एरवी करतो त्या करण्याऐवजी त्यामध्ये वेगळेपण ठेवा, ही कल्पना त्यांनी मांडली. नावीन्याच्या या अनुभवाला ‘न्युरोबिक्स’ असं समर्पक नाव त्यांनी दिलं आहे. न्युरोबिक्सच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीत पाचही ज्ञानेंद्रियं आणि त्याबरोबर आपलं मन, भावना अनोख्या मार्गानं वापरल्या जातात. अशा रीतीनं ज्ञानेंद्रियांना एक प्रफुल्लित अनुभव देणं म्हणजे न्युरोबिक्स.

फ्रान्समधील मोनिक ल पॉन्सिन यांनी असं स्पष्ट के लं आहे, की मेंदूचे व्यायाम अवघड, अनाकलनीय असण्याची काही आवश्यकता नाही. सोपे, आनंददायी व्यायाम केल्यानंसुद्धा फायदा होऊ शकतो. ‘हे व्यायाम करण्यासाठी वेळ नाही असंही कारण पुढे करू नका,’ असं त्या सांगतात. कारण प्रवास करताना, जेवणाच्या सुट्टीमध्ये, स्वयंपाक करताना, इतर काही बारीकसारीककाम करतानाही असे व्यायाम करता येऊ शकतात.

क्रमशः….

© सुश्री मंगला जोगळेकर

 ≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रंग जीवनाचे…..☆ सौ. सुचित्रा पवार

सौ. सुचित्रा पवार

?  विविधा  ?

☆ रंग जीवनाचे ….⛱ ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

जन्मतः च बाळाला रंग ओळखता येत नाहीत पण हळू हळू कळू लागतात… म्हणजे भडक काही दिसले की ते तिकडेच पहाते म्हणून मग पाळण्याच्या चिमण्या रंगीत… जरा मोठे झाले की मग येतो सोबतीला चेंडू, प्लास्टिक पोपट,वेगवेगळी खेळणी वेगवेगळे रंग घेऊन !  लाल, हिरवा, निळा  तिकडे मग बाळ आकर्षित होते अन खेळण्यात हरवते.

अशा रीतीने रंग जीवनात हळू हळू डोकावू लागतात.शाळेत जाऊ लागले की होते मग रंगांची ओळख अन मग रंगीत कपडे, खेळणी, बांगड्या, मेंदी, रांगोळी रंग भरत जातात जीवनात !  कळत्या वयात एकच कुठला तरी रंग आवडतो अन त्याच रंगांच्या सोबतीने मनुष्य चालत रहातो..

खरेच देवाने रंगांची ही दुनिया दिलीच नसती तर ? माणसाचे जीवन निरस बेरंग असते !  उगवतीला अन तिन्ही सांजेला क्षितिजावर सूर्याने उधळलेले लाल पिवळे, केशरी रंग… फुलांचे, पानांचे रंग, पक्ष्यांचे रंग, काजव्याचे… कीटकांचे रंग.. किती रंग असतात अवतीभोवती !

आकाशाचा… ढगांचा… झाडांचा… रंग पांघरता यायला हवा, घेता आणि जगताही यायला हवा अन नकोसे रंग टाकताही यायला हवेत चटकन नाहीतर मग बेरंग होतो जीवनाचा !

समोरच्याचा राग रंग ओळखता यायला हवा.. अन्यथा आपला रंग बिघडतो ! असे असले तरी फरुडासारखे रंगही बदलणे नकोच कारण मग तुमचा रंग नक्की कोणता ? कळणे मुश्किल होईल अन विश्वासही उडेल तुमच्यावरचा !

सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा अन आवडीचा रंग प्रेमाचा ! हा रंग एकच पण तो जीवन रंगीबेरंगी करतो ! सप्तरंगी इंद्रधनू छेडतो. प्रीतीचा हा गुलाबी रंग ज्याच्या आयुष्यास    लाभला त्याचे जीवन विविधरंगानी बहरते,ताजेतवाने होते,सदाबहार ठेवते जीवनाला अन वयालाही !

रागाचा रंग लाल अन शांतीचा पांढरा, दुःखाचा काळा, रात्रही काळी अन निसर्ग हिरवा !

जीवनातला  महत्त्वाचा गडद न पुसणारा रंग अध्यात्माचा… जीवन सन्मार्गावर नेणारा… शांत संयमित जगायला शिकवणारा तो भक्तीचा रंग…

विठूच्या भाळी सजणारा तो अबिराचा काळा, विठ्ठलही काळा अन माणसाचे पोट भरणारा मातीचा रंगही काळा !  सर्वच रंग जीवनात तितकेच महत्वाचे..

रंगांची ही विविधरंगी दुनिया मानवाचे जीवन रंगीत करते हेच खरे !

 

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दिवाळीची सांगता… ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?  विविधा ?

☆ दिवाळीची सांगता… ☆ सौ राधिका भांडारकर  

चार दिवसांची दिवाळी.धामधूमीत आली आणि गेलीही.

खप्पून ,पूर्वतयारी करून केलेले फराळाचे भरले डबे तळाशी गेले.रांगोळीतले रंग भुरकटले .तेलवातीत भिजलेल्या पणत्या गोळा करून ठेवल्या. काही दिवसांनी आकाश कंदीलही उतरवले जातील.ईलेक्ट्रीकच्या माळा गुंडाळून पुढच्या दिवाळीपर्यंत नीटनेटक्या कपाटात ठेवल्या गेल्या.

अंगणातला फटाक्यांचा ,धूम्मस वास असलेला कचराही गोळा करुन झाला..

गॅलरीतल्या एका टाईलवर सारवलेला गेरु मात्र होता.

कसा रिकामा ,रंगहीन दिसत होता.सकाळी झाडपूस करणारी बाई मला विचारत होती,”अव ताई पुसु का आता हे तांबड..?लई वंगाळ दिसतय्…”

मी म्हटलं,”पुस बाई..झाली आता दिवाळी….”

करोना,सुरक्षित अंतर,भयभीत मने या सगळ्या पार्श्वभूमीवरही प्रत्येकाने आपापली दिवाळी साजरी केलीच.अंधारावर मात करणारा प्रकाशाचाच सण …

धाग्यांच्या गुंतागुंतीत एखादा कलाबुतीचा तार कसा चमकून जातो ना …तशीच या दिवाळीनं चमक आणली…

चार दिवसांचे चार सोहळे..गायीला घास भरवला,धनाची पूजा केली,लक्ष्मीलाही पूजलं,रूपकात्मक नरकासुराचाही वध केला,ईडा पीडा टळो,बळीचं राज येवो,असा गजर केला,सहजीवनाची आनंद औक्षणे केली, आनलाईन भाऊबीजही साजरी केली..तेल ऊटणे सुगंधी साबणांनी स्नानं ऊरकली… रांगोळ्यांनी दार सजले.

फुलांच्या तोरणांनी चौकट नटली..कोपरा न् कोपरा प्रकाशानं ऊजळवला…झुमवर सगळं गणगोत गोळा झालं..व्हर्चुअल फराळ .व्हर्चुअल फटाके…शुभेच्छा ,आशिर्वाद. सगळं सगळं आॅनलाईन…

कसं असतं ना ,मनुष्यप्रवृत्ती मूळातच आनंद साजरा करणारी असते.भले आनंदाची माध्यमे बदलोत पण हेतु नाही बदलत…दिवाळी हा तर आनंदाचा, प्रकाशाचा,
स्नेहबंधनाचा ,स्नेहवर्धनाचा सण!!

शिवाय या सणांत निसर्ग,देवदेवता ,पशुपक्षी झाडंपानं सार्‍यांचं संवर्धन असतं…आपल्या संस्कृतीत केरसुणीलाही लक्ष्मी मानून तिचीही पूजा केली जाते.

यामागचा संदर्भ खूप अर्थपूर्ण आहे…चराचरात लहान थोर असं काही नसतं…मनातली विषमता दूर करुन सार्‍यांना सामावून घ्यायचं असतं… एका वातीनं दुसरी वात पेटते म्हणूनच तेलाचा दिवा पूजनीय…

मनातल्याच आसुरांचा संहार करायचा…नको लोभ,नको स्वार्थ..नको हिंसा नको असत्य…नको द्वेष नको मत्सर..असुया…वृद्धी प्रेमाची ,स्नेहाची..परोपकाराची व्हावी..
दिवाळी म्हणून साजरी करायची…

दिवाळी आली,संपली पण जाताना याच जाणीवा देऊन पुन्हा येण्यासाठीच परतली…

कवीवर्य ना.धो.महानोर परवा म्हणाले,

“मोडलेल्या माणसांचे..

दु:ख ओले झेलताना..

त्या अनाथांच्या ऊशाला..

दीप लावू झोपतांना..।।

दिवाळीची सांगता करताना याच ओळी सोबत रहाव्यात…

शूभ दीपावली!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ श्वानपुराण….. ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ  ज्योती विलास जोशी

?  विविधा ?

☆ श्वानपुराण….. ☆ सौ  ज्योती विलास जोशी 

बालवाडीतल्या माझ्या भावाची फी द्यायची म्हणून शिशु वर्गाची पायरी चढले,आणि पायरीवर पायरीगत दिसणाऱ्या कुत्र्यावर माझा पाय पडला.लगेच ‘सॉरी’ म्हटलं मी त्याला पण कुत्रचं ते… ‘जशास तसे’ या उक्तीनुसार ते चावलं मला अन् मी केकाटले. माझी जीवघेणी किंकाळी ऐकून शिरोळे गुरुजी धोतराचा सोगा सावरत बाहेर आले.मला एक जोरदार शिवी हासडून म्हणाले,” तू त्याच्यावरचं कशाला पाय ठेवलीस? पायरी नव्हती तुला पाय ठेवायला?त्याच्या का नादी लागलीस? गप पडलं होतं ना ते?” गुरुजी कुत्र्याची वकिली करत होते. कुत्र्याची खोडी काढायला, त्याचा नाद करायला मी निर्बुद्ध का आहे? पण गुरुजींच्या नादी कोण लागणार?माझ्या हातातले फीचे पैसे काढून घेऊन,”चल हेड बाईकडं..असं म्हणून माझा रट्टा धरून शिरोळे गुरुजींनी मला हेड बाईच्या पुढ्यात उभं केलं. हेडबाईच्या सांगण्यावरून त्यांनी मला माझ्या घरी पोहोचवलं.

कुत्रा चावल्यानं सरकारी हॉस्पिटल मध्ये माझ्या पोटांनं चौदा दिवस इंजेक्शनचा त्रास सोसला. मला कुत्रा चावल्याची बातमी पेपरमध्ये कदाचित येईल या आशेवर मी होते आणि पेपर चाळत होते.”अगं कुत्रा तुला चावला तर ती बातमी होऊ शकत नाही. याउलट तू कुत्र्याला चावली असतीस तर ती बातमी झाली असती” असं बाबा म्हटल्याचं आठवतं मला.

कुत्रा हा बातमीचा विषय नसून जिव्हाळ्याचा विषय आहे.हे माझ्या लक्षात आलं पण जेव्हापासून तो मला चावला तेव्हापासून कुत्र म्हटलं की मी नखशिखांत हादरते.तो माझा वीक पॉइंट झाला आहे. लहानपणी ‘हाथी मेरे साथी’ दोन-चारदा पाहिला…..प्रत्येक वेळी नव्याने पाहतो असा पाहिला…. प्रत्येक वेळी तेवढ्याच संवेदनशीलतेने रडून थिएटर डोक्यावर ही घेतलं.माझं मुसूमुसू रडं पाहून इतरेजन खुसूखुसू हसायचे, पण….. कुत्र्याची प्रमुख भूमिका असलेल्या ‘तेरी मेहरबानियाॅ’ या सिनेमाच्या पोस्टरकडेसुद्धा ढुंकून बघायची माझी इच्छा नसायची. इतका तिटकारा मला त्या कुत्र्याच्या चेहऱ्याचा….

स्वामीनिष्ठ, इमानदार अशा विशेषणांनी सुशोभित आणि रतन टाटा, बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज अशा प्रतिथयश लोकांच्या कुत्र्यावरील प्रेमाने प्रसिद्ध आलेल्या या जातीचा मला कधीकधी हेवा वाटतो. रतन टाटांनी गोव्याहून आणलेल्या ‘गोवा’ नावाच्या आपल्या कुत्र्याला आपल्या ग्लोबल हेडक्वारटर मधील म्हणजेच बॉम्बे हाऊस मधील खास जागेत ठेवलं आहे. शिवाजी महाराजांचा ‘वाघ्या’ तर सगळ्या मराठी माणसात प्रसिद्ध !! बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘टाॅबी’ कुत्रा सर्वश्रुत आहे.अमेरिकेतील एका शहरात एका मालकाने आपल्या मृत्यूनंतरची छत्तीस कोटीची प्रॉपर्टी ‘लुलू’नावाच्या त्याच्या कुत्र्याच्या नावे केली आहे. अहोभाग्य त्या कुत्र्यांचं !!!

कुत्र्यांच्या नावावरून एक गंमत अशी की आमच्या वाड्याच्या मालकिणीनं स्वतःच्या कुत्र्याचं नाव ‘पुराणिक’ठेवलं होतं. मी त्यावेळेस सात आठ वर्षाची असेन….मला आठवतंय मी बाबांना कळकळीनं असं सांगितलं होतं की माझं लग्न ‘पुराणिक’ आडनावाच्या माणसाची होता कामा नये.बाबांना फार उशिरा माझ्या त्या कळकळीच्या विनंतीचं प्रयोजन समजलं होतं…..

प्रेम म्हणजे प्रेम असतं,ते कुणी कुणावर करावं हा ज्याचा त्याचा प्रश्‍न असतो. कुत्र्याबद्दलची माझी भूमिका स्वच्छ आहे.माझं त्याच्याशी वैर नाही पण त्याच्याविषयी प्रेम बिलकुल नाही. एकदा एका

मैत्रिणीकडे गेले होते. कसं कोणास ठाऊक पण ‘कुत्र्यापासून सावध राहा’ या पाटीकडं माझं लक्ष गेलं नाही. तिच्या घराची पायरी चढणार तो पुनश्च पायरीवर एक पायरीच्याच रंगाचं कुत्र झोपलेलं….. इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी अर्थातच मी घेतली.तिला खालूनच फोन केला. “अगं काही करत नाही ते.” प्रत्यक्ष भगवंताला देखील इतक्या गॅरंटीनं सांगता येणार नाही तसं तिनं सांगितलं. “ओलांडून ये त्याला”( तो कोणावरच भुंकत नाही कोणालाच काही करत नाही. तर मग पाळलासंच का बिचारे ?असा प्रश्न मनांत आल्यावाचून राहिला नाही.) घाबरलेल्या भेदरलेल्या अवस्थेत मी त्याला ओलांडायला गेले आणि माझा पाय त्याच्यावर पडलाच. सिंहाच्या पिंजऱ्यात लाईट गेलेल्या रिंगमास्टरची काय अवस्था होईल तशी माझी झाली. इतक्यात मैत्रीण खाली आली. “किती घाबरतेस ग ?काही केलं का त्यांनं तुला?भुंकला देखील नाही गं तो!!”असं म्हणून तिने त्याला कडेवर घेतलं.”कम हनी, कम टू मम्मा” असं मातृप्रेम दाखवणाऱ्या तीच श्वानप्रेम बघून मी धन्य झाले, पण अप्रूप अजिबात वाटलं नाही त्या गोष्टीचं….

सकाळी फिरायला जाताना टापू टापूत बसलेली भटकी कुत्री आता माझ्या ओळखीची झाली आहेत. अर्थात असा हा माझा दावा…. माहित नाही कधी घेतील ती माझा चावा…. मालकाचं गळ्यात पट्टा बांधलेलं कुत्र दिसलं की संघटितपणे जोरजोरात त्याच्यावर ती भुंकायला लागतात. अगदी थेट ते टापूतून बाहेर पडेपर्यंत… वाघासारखं दिसणारं ते मालकाच्या संरक्षणाखाली ऐटीत चालत असतं. मालकाला जणु ते सांगत असतं आत्ता मला तू संभाळ. नंतर तुझं रक्षण करायची जबाबदारी माझी….तसा त्या दोघांत एक अलिखित करार असावा बहुदा…चार आण्याचा जीव असलेली ती भटकी कुत्री पण त्यांचा आवाज एखाद्या डॉल्बी लाऊड स्पीकर सारखा! आसमंत हादरवून टाकणारा!गांधीजीं सारख्या अहिंसावादी माणसानं भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर घेतला होता त्या बापूजींना माझे प्रणाम…..

रस्त्यावरच्या सार्वजनिक वाचन केंद्रावरची दोन कुत्री कुठलंही वाहन आली की त्या वाहनाच्या वेगानं फर्लांग भर पळत जातात आणि माघारी येतात. हे मी रोज पाहते. एक दिवस न राहून मी त्याच्या प्रमुखांना म्हटलं,”अहो यांना बांधून ठेवा की! उगा आपलं वाहनांच्या मागे पळत सुटतात.”त्यावर ते म्हणाले.”असुद्या मॉर्निंग रनिंग करतात !एरवी लडदूछाप आहेत. खाऊन खाऊन माजलीत दोघं.पहुडलेलीच असतात दिवसभर…. कोणावर भुंकत नाहीत. एन्जॉय करतात लाइफ झालं”….

जेव्हा मी ह्यांची अर्धागीनी झाले तेव्हा मात्र कुत्रं पाळणं हा माझ्या अस्तित्वाचा प्रश्न बनला. याचं कारण हे ‘श्वानप्रेमी’ आणि कुत्रा हा माझा वीक पॉइंट… अर्थात लग्नानंतर इतके चांगले विषय आम्हा दोघात होते की कुत्र्यासारखा विषय संभाषणात कधी आलाच नाही. त्यामुळं मला कुत्र्या विषयी इतका आकस आहे हे त्यांना ठाऊक नव्हत. तीन महिन्याची ओली बाळंतीण मी जेव्हा परतले त्यावेळी ह्यांनी माझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट म्हणून घरी आणलेलं छोटासं कुत्र्याचं पिल्लू मला दाखवलं. मला ह्यांनी दोन बाळाची आई करून टाकलं होतं. पण मला मंजूर असायला हवं होतं ना ते?

मी अजूनही काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. ह्या गोष्टीचे त्यांनाही आश्चर्य वाटत होतं. दोन्ही पिल्लं अखंड कुई कुई करत होती. त्यात भरीस भर म्हणजे मालकिणीचं कुत्रं! एरवी ‘आओ जाओ घर तुम्हारा’ म्हणणारं ते आज आपल्या टापूत आलेल्या या नवख्या कुत्र्यावर अखंड भुंकत होतं. मालकीण यथावकाश खाली आली. माझं बाळ तिच्या हातात होतं ती म्हणाली,”आजच आलाय.आमचं कुत्र भुकायचं थांबणार नाही तेव्हा तुमच्या कुत्र्याला आजची रात्र घरातच बांधा. उद्या काहीतरी व्यवस्था करू” ……

दोन्ही पिल्लानी रात्र जागवली हे सांगायला नकोच. त्या दोघांकडे पाहात मी यांना माझं सगळं श्वासनपुराण सांगितलं आणि पहाटे पहाटे मी यांच्याकडून मला हवं असलेलं ते एक वचन घेतलं. वचन देता देता, ‘जे लोक कुत्रं पाळतात त्यांच्या घरी लक्ष्मी येते’असंही माझं समुपदेशन झालं, पण मला ‘लक्ष्मी’ नको होती, ‘शांती’ हवी होती. स्त्रीहट्ट कुणाला सुटलाय ?….सकाळ सकाळी कुत्र्याच्या पिल्लाची गावाकडं रवानगी झाली.. आणि माझं पिल्लू शांत झोपू लागलं.

भविष्यात पुन्हा या गोष्टीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मी ह्यांना निक्षून सांगितलं,” एका म्यानात दोन तलवारी कधीच बसत नाही.ज्या दिवशी कुत्रं या घरात येईल त्या दिवशी मी बाहेर पडलेली असेन…..” अजून तरी तशी वेळ आलेली नाही.

सध्या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. या करोना काळात कधीतरी कुत्र्याचं रडणं अपशकुनाचा संकेत देतं, तेव्हा  हे म्हणतात…

“अगं ,आम्ही जसे कुत्र्याचे शौकीन तसेच कुत्र्यांनाही आमची सवय… आताशा आम्ही त्यांना फारसे दिसत नाही आहोत ना रस्त्यावर म्हणून ती कावरीबावरी होऊन रडतात…..”

ते काही असो. कुत्र्याला ‘श्वान’ किंवा ‘सारमेय’ म्हणावं असं मला कधी वाटत नाही .कुत्रं समोर आलं की या जन्मी तरी हाssssड ……

हेच शब्द ओठी……

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares