मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! फिटनेसचा फ़ंडा ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? फिटनेसचा फ़ंडा ! ?

“गुडमॉर्निंग पंत !”

“नमस्कार, पण आज तुझा आवाज एकदम रडवेला का आणि खांदा कशाला चोळतोयस तुझा ?”

“काठी लागली पंत, डोक्याच खांद्यावर निभावलं, तुमच्यकडे आयोडेक्स असेल तर द्या जरा.”

“देतो देतो, पण सकाळी सकाळी बायको बरोबर भांडण…. “

“नाही हो पंत, जोशी काकूंची काठी लागली.”

“जोशी काकूंची काठी तुला कशी काय लागली ?”

“अहो हा सगळा त्या केळकर काकांचा फिटनेस फ़ंडयाचा प्रताप.”

“आता यात केळकर कुठून आला ?”

“सांगतो सांगतो. तुम्हाला माहीतच आहे सध्या सगळ्या जिम वगैरे बंद आहेत आणि सगळेच आपापल्या घरी अडकल्यामुळे… “

“तू मूळ मुद्यावर ये आधी, उगाच पाल्हाळ नकोय.”

“हां, तर घर बसल्या आणि चाळीत फिरून करायचे काही व्यायाम प्रकार केळकर काकांनी काही लोकांना शिकवले.”

“बर, पण त्यात जोशीणीचा काय संबंध ?”

“पंत केळकरांनी जोशी काकूंना शाखेत जसे काठीचे हात फिरवायला शिकवतात तसे काही प्रकार शिकवले.”

“पण तिच्या काठीचा आणि तुझ्या खांद्याचा… “

“अहो पंत त्याच काय झालं, आता जोशी काकू चाळभर,  धुण्याची काठी घेऊन दोन्ही हाताने फिरवत फिरत असतात.”

“काय सांगतोस काय, अख्ख्या चाळभर ?”

“हो ना आणि त्यांच्या काठीचा प्रसाद माझ्या प्रमाणेच अनेकांना बसून चाळीत

भांडणांचे जंगी सामने सुरु झालेत.”

“अरे बापरे !”

“इतकंच नाही काकूंच्या काठीने चाळीतले यच्चयावत सार्वजनिक दिवे पण फुटले ते वेगळेच.”

“काय बोलतोयस काय ? सगळे सार्वजनिक दिवे… “

“फुटले आणि त्यावरून होणारी चाळकऱ्यांची भांडणं सोडवता सोडवता, माझ डोक फुटायची पाळी आल्ये.”

“बर बर, मी असं करतो तुला आयोडेक्स बरोबर अमृतांजन पण देतो मग तर झालं ?”

“पंत इथे माझी काय हालत झाल्ये आणि तुम्हाला विनोद सुचतायत !”

“यात कसला विनोद, तुझ्या दुखऱ्या खांद्यासाठी आयोडेक्स मागायला तूच आला होतास आणि आता तुझ लोकांच्या भांडणामुळे डोक फुटायची वेळ आल्ये म्हणालास म्हणून मी तुला आपणहून अमृतांजन.. “

“खरच आहे ते, अमृतांजन पण लागेलच मला, कारण तुम्हाला अजून बर्वे काका आणि साने काकांच्या भांडणा बद्दल… “

“आता ते दोघे कशाला भांडले एकमेकाशी ?”

“इथे पण केळकर काकांचा  फिटनेस फ़ंडाच कारण झाला.”

“तो कसा काय ? “

“पंत त्यांच्या फिटनेस फ़ंडयात  दोरीच्या उडया पण होत्या.”

“हो, तो पण एक चांगला घरगुती व्यायाम प्रकार आहे खरा.”

“पंत, सानेकाका त्यांच्या घरात दोरीच्या उडया मारत होते आणि त्याच वेळेस खालच्या मजल्यावरचे बर्वेकाका जेवत होते !”

“म्हणजे दोघेही आपापल्या घरीच होते ना, मग भांडणाचा संबंध आला कुठे ?”

“अहो पंत साने उडया मारायला लागले की खाली बर्व्यांच्या ताटात त्यांच्या सिलिंगची माती पडायची !”

“अरे चाळीस वर्षात चाळ खिळखिळी झाल्यावर सिलिंग मधून माती नाहीतर काय सोन  पडणार आहे ? तूच विचार कर म्हणजे झालं.”

“हो बरोबरच आहे पण त्यामुळे बर्वे काकू आल्या माझ्याकडे तणतणत. मी काकूंना म्हटलं, बर्वे काकांना ताट घेऊन दुसरीकडे बसून जेवायला सांगा.”

“बरोबर आहे तुझ, मग ?”

“त्यावर बर्वे काकू मला म्हणतात कशा ‘ती ह्यांची जेवायला बसायची रोजची जागा आहे, दुसरीकडे बसून जेवलं तर त्यांना जेवण जात नाही’ आता बोला ?”

“अरे बापरे, असं म्हणाली बरवीण ?”

“हो ना, वर मला सांगायला लागल्या ‘तूच सान्याला सांग उडया मारायची त्यांची जागा बदलायला’ आणि गेल्या तरातरा निघून घरी.”

“मग तू काय केलंस ?”

“काय करणार, गेलो साने काकांकडे, झाला प्रकार सांगून त्यांना म्हटलं, तुम्ही प्लीज जरा तुमची दोरीच्या उडया मारायची जागा बदलता का ?”

“मग काय म्हणाला सान्या?”

“साने काका म्हणाले ‘मी माझ्या घरात कुठ उडया मारायच्या आणि कुठे नाही हे मला सांगायचा कुणाला अधिकार नाही. तूच बर्व्याला त्याची जेवायची जागा बदलायला सांग.’ असं म्हणून माझ्या तोंडावर धाडकन दार लावले त्यांनी.”

“फारच पंचाईत झाली असेल ना तुझी त्या वेळेस.”

“हो ना, दोघेही वयाने मोठे आणि हट्टाला पेटलेले.”

“मग कसा काय मार्ग काढलास त्यातून तू ?”

“मार्ग कसला काढतोय, घरी येवून मस्त ताणून दिली. पण पाच मिनिट आडवा पडतोय न पडतोय, तोच दाराची कडी वाजली.”

“उगाच तुझी झोप मोड झाली ना, पण दारात कोण आलं होत तुझी झोप मोडायला ?”

“अहो दार उघडून बघतोय तर काय, पहिल्या मजल्यावर जिन्याशेजारी राहणारे राणे काका, रागाने लालबुंद होऊन दारात उभे.”

“आता राण्याला राग यायच काय कारण ?”

“मी विचारलं राणे काकांना, तर मला म्हणाले वरच्या कोकणे काकांनी त्यांची झोप मोड चालवली आहे, जिन्याने सारखं वर खाली जाऊन येवून.”

“जाऊन येवून म्हणजे, मी नाही समजलो.”

“पंत हा पण केळकर काकांचा फिटनेस फ़ंडा.”

“म्हणजे त्यांचे भांडण पण केळकराच्या फिटनेस फ़ंडया मुळे झाले की काय? “

“हो पंत, केळकर काकांनी कोकणे काकांना घरी बसून बसून त्यांचे वजन वाढल्यामुळे आणि घुडघे दुखत असल्यामुळे, जिने चढण्या उतरण्याचा व्यायाम सांगितला होता करायला.”

“बरोबरच आहे केळकराच आणि तुला दुसरा एक उपाय सांगतो गुडघे दुखीवर.”

“पंत इथे मी कशाला आलोय आणि तुम्ही मला….”

“अरे ऐकून तर घे, गुडघे दुखत असतील तर कमरे एव्हढया पाण्यात रोज अर्धा तास चालायचं, घुडघे दुखी कुठच्या कुठे पळून जाईल बघ तुझी.”

“आता मीच पळतो पंत, तुमचं बोलण ऐकून माझ डोक खरच फुटेल की काय अस वाटायला लागलं आहे.”

“सॉरी सॉरी, पण कोकण्याच्या जिन्याने खालीवर जाण्याने,  राण्याची कशी काय बुवा झोप मोडायची, ते नाही समजलं !”

“अहो कोकणे काकांचा अजस्त्र देह जिन्याने खाली वर करू लागला की आपल्या चाळीचे आधीच जीर्ण शीर्ण झालेले लाकडी जिने… “

“दाण दाण आवाज करायचे आणि राण्याची खोली जिन्याजवळ असल्यामुळे त्याच्या झोपेचं खोबरं व्हायच, बरोबर ?”

“बरोबर पंत, त्यामुळे त्या दोघांचे पण कडाक्याचं भांडण झालं आणि दोघेही माझ्याकडे एक मेकांची तक्रार घेऊन आले आणि …. “

“तू नेहमी प्रमाणे माझ्याकडे यावर उपाय सुचवा म्हणून, काय खरं ना?”

“हो पंत, तुम्हीच चाळीत सगळ्यात जुने जाणते आणि अनुभवी …. “

“नेहमीची मस्काबाजी पुरे ! आता मला आधी सांग, आपल्या चाळीतले योगा शिकवणारे गोरे गुरुजी सध्या चाळीत….. “

“नाहीत ना, ते मध्यतंरी गावाला गेले आणि सध्याच्या परिस्थितीमुळे गावालाच अडकलेत.”

“बर बर आणि योगासन पण कुणाच्या तरी देखरेखी खाली केलेली बरी, नाहीतर उगाच कोणाला तरी त्याचा त्रास पण होऊ शकतो.”

“मग कसं करायच आता पंत.”

“अरे मी असतांना कशाला घाबरतोस.  उद्याच्या उद्या एक पत्रक काढ, चाळ कमिटीचा अध्यक्ष म्हणून.”

“बर, पण त्या पत्रकातून काय सांगायचं लोकांना?”

“लोकांना सांगायचं की कोणीही केळकराचा फिटनेस फ़ंडा वापरायचा नाही.”

“मग पंत लोकांनी फिट राहण्यासाठी काय करायच?”

“माझा फिटनेस फ़ंडा वापरायचा !”

“तुमचा फिटनेस फ़ंडा, म्हणजे काय पंत ?”

“काही नाही, ज्या लोकांना या लॉक डाऊन मधे फिट रहायच आहे त्यांनी आपापल्या घरात रोज सकाळी फक्त बारा सूर्य नमस्कार घालायचे, बस्स.”

“त्यानं लोक खरंच फिट राहतील पंत ? “

“यात तुला शंका घ्यायच कारणच नाही. “

“ते कसं काय पंत?”

“अरे शास्त्र शुद्ध पद्धतीने घातलेल्या प्रत्येक सूर्य नमस्कारात सगळी योगासन समाविष्ट असतात, हे माहित्ये का तुला ?”

“नाही पंत, पण लोकांना शास्त्र शुद्ध पद्धतीने सूर्य नमस्कार घालायला…. “

“मी शिकवणार आणि प्रत्येकला सांग, की घरात राहून ज्यांना ज्यांना फिट रहायच त्यांनी….”

“पंतांना भेटून शास्त्र शुद्ध सूर्य नमस्कार कसे घालायचे ते लवकरात लवकर शिकून घ्या आणि…. “

“केळकराच्या फिटनेस फ़ंडयामुळे होणारी चाळीतली भांडणे टाळा.”

“धन्य आहे तुमची पंत !”

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भाकरीयन … भाग दुसरा ☆ सौ. सुचित्रा पवार

सौ. सुचित्रा पवार

?  विविधा  ?

☆ भाकरीयन … भाग दुसरा ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

(इथंच हाताला पहिला चटका बसतो.) इथून पुढे —-

एका हाताने पाणी न दुसऱ्या हाताने पीठ मर्दत रहायचे,पाणी बेतानेच घालत रहायचं अन्यथा पीठ पातळ होते आणि भाकरी थापली जात नाही.तर पीठ मळत मळत छानसा मऊ गोळा तयार करायचा मग परातीत थोडेसे पीठ पसरून त्यावर गोळा ठेवून हलक्या हाताने गोल गोल थापायला सुरुवात करायची,डावा हात कडेला लावून आकार एकसारखा राखण्याचा प्रयत्न करायचा.(अधून मधून जाळ एकसारखा करत रहायचं,एक म्हणजे एकच काम करत राहिले तर तवा थंड पडायचा.)थोडी पुढं सरकली भाकरी की मग दोन्ही हातानी थापायला सुरुवात करायची.उजवा हात मध्यभागी न डाव्या हाताने  कडेवर एकसारखा हलकासा दाब देत देत गोळ्याच्या प्रमाणात भाकरीचा गोल ठरवायचा.(पण भाकरी थापताना पण एक गंमत होते-गोळ्या खाली पीठ जास्त झाले तर बाजूच्या कडांवर येते आणि भाकरी भाजली की ती  खालच्या बाजूने पिठूळ पांढरी दिसते.पीठ कमी झालं तर भाकरी मधेच चिकटते आणि गोल फिरत नाही आणि पुढेही सरकत नाही; म्हणून खालच्या पिठाचा बिनचूक अंदाज अनुभवानेच येतो.)एकदम गोळा घट्ट झाला की भाकरी चिरते.भाकरी चिरली की तिथं मळलेल्या पिठाचा जोड दिला तरीही ती एकसंध होत नाहीच.गोळा घट्ट झाला तरी भाकरी पुढं सरकत नाही आणि गोळा पातळ झाला तरी खाली चिकटतो आणि भाकरी पुढं सरकत नाही किंवा  भाकरी उचलून टाकताना तुकडे तरी पडतात किंवा मधेच हात जाऊन भसका तरी पडतो.इतकी सारी काळजी घेत थापलेली भाकरी  हळुवार पणे कडेला नेत पटकन उचलून तव्यात न सुरकुती पडता चटकन टाकण्याचे पण कसब असावे लागते.पूर्वीचे लोखंडी तवे खोलगट असायचे भाकरी तव्यात टाकताना मनगटाच्या आतल्या बाजूने बांगडी जवळ चरदिशी चटका बसायचा,हा दुसरा चटका! आता जाळ पुन्हा एकसारखा करून समान जाळ लागतोय का बघायचे अन्यथा जिथं कमी जाळ लागत असेल तिथं तवा थोडासा उचलून दगडाची बारीक चिप सारायची मग भाकरीवर पुरेसे पाणी फिरवून दुसऱ्या भाकरीकडे वळायचे.जसजशी चूल तापू लागेल तसे निखारे बाहेर काढायचे,भाकरीला लावलेले पाणी सुकले असले तर भाकरी पलटी करून पुन्हा तव्यात टाकायची.( इथं पण एक गंमत अशी होते की पाणी जास्त झाले तर भाकरी पचत नाही लवकर आणि लावलेले पाणी सुकून गेले तर भाकरी चिरते न कडक होते त्यामुळं कींचित ओली आहे तोवरच भाकरी पलटायची)

चुलीतला जाळ एकसारखा करत तव्यातली सर्व बाजूनी भाजलेली भाकरी चुलीतले निखारे बाहेर छोट्या वाफ्यात बाजूला ओढून लावायचे त्याला चुलीचा आधार देऊन भाकरी उभी करायची,तोपर्यंत परातीत थापून झालेली भाकरी तव्यात टाकायची,जाळ एकसारखा करायचा,एखादी ढलपी,शेणकुटाचा तुकडा किंवा चार चिपाड आत सारून नवीन भाकरी थापायला घ्यायची, तोपर्यंत निखाऱ्यावरची भाकरी फुललेली असते,ती काढून बुट्टीत टाकायची.पहिल्या भाकरीतला एक छोटासा तुकडा काढून अग्नीला अर्पण करायचा आणि पाण्याचे चार शिंतोडे चुलीत मारायचे मग पुढच्या भाकरीकडे वळायचे. जळण बाभळीचे,लिंब करंज असे कठीण असले तर निखारे चांगले रसरशीत पडतात मग भाकरी पटपट भाजतात. नुसत्या चिपाडाचे निखारे पडत नाहीत त्यामुळं जळण चांगल्या दर्जाचे असले तरच भाकरी पटापटा होतात चूल एकसारखी धगधगत रहाते आणि कितीही भाकरी कराव्या लागल्या तर कंटाळा येत नाही.चिपाड मात्र सारखी विझतात आणि सारखा जाळ घालून भाकरी थापताना बाईचा जीव रडकुंडी येतो.या सर्वातून तावून सुलाखून बाई भाकरीत निष्णात होते.

तर कुणाच्याही भाकरीला इथून पुढं नावं ठेवताना भाकरियन नक्की आठवा.

आजकाल मुलींना कुणी स्वयपाक घरात येऊच देत नाही त्यामुळं आई स्वैपाक करताना निरीक्षण बिरीक्षण असली काही भानगड नसते शिवाय स्वैपाक करण्याची गोडीही लावली जात नाही. गॅसवर भाकरी चांगल्याच होतात .एखादं वेळेस भाकरी नाही आली तरीही चालते कारण दोन वेळेस चपातीच खाल्ली जाते. आमची मुलगी शिकल्या, नोकरी करणार मग स्वैपाकाची तिच्याकडून स्वैपाकाची अपेक्षा करू नका असे सांगणारे देखील आईवडील आहेत पण माणूस प्रेमाने बांधून ठेवण्यात चांगल्या स्वैपाकाचा देखील महत्त्वाचा वाटा आहे.

असो,आम्ही अशा पद्धतीने शाळा शिकत शिकत सर्वच कामे करत जबाबदार झालो.त्यामुळं जीवनात कधीच कुठल्या प्रसंगाला मागे हटलो नाही कितीही स्वैपाक असो,धुणे असो की भांड्याचा खिळा काहीच वाटत नाही सहजच कामे करून टाकतो.

स्वतःचे पोट भरण्याइतपत तरी चविष्ट आणि सकस स्वैपाक प्रत्येकीलाच करता यायला हवा असे माझे स्पष्ट मत आहे.बाहेरचं कितीही महागडे चविष्ट  खाद्यपदार्थ असले तरी घरच्या साध्या सात्विक जेवणाची सर नाहीच!

(कसे वाटले भाकरियन? आवडले तर नक्की पुढं पाठवा)

समाप्त 

© सौ.सुचित्रा पवार

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भाकरीयन … भाग पहिला ☆ सौ. सुचित्रा पवार

सौ. सुचित्रा पवार

?  विविधा  ?

☆ भाकरीयन … भाग पहिला ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

‘अरे संसार संसार जसा तवा चुल्हावर

        आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर.’

भाकरीचे उदाहरण देऊन संसाराचा सार्थ अनुभव बहिणाबाईंनी सांगितलाय. भाकरी हवी असेल तर त्यासाठी तव्याचे चटके, चुलीची धग सहन करायलाच हवी. कोणतीही इच्छित गोष्ट सहज प्राप्त होत नाही असेच बहिणाबाईंना सुचवायचे आहे. सुख हवे असेल तर दुःख झेलावे लागते,हिरवळ हवी असेल तर उन्हातानातून चालावे लागते,परमेश्वरभेट हवी असेल तर कठोर तपश्चर्या करावी लागते, मोह मायेपासून अलिप्त रहावे लागते. थोडक्यात एखादी गोष्ट विनासायास मिळाली की तिचे महत्व रहात नाही मात्र तीच वस्तू प्रयत्नातून,परिश्रमातून मिळाली असेल तर तिचा आनंद अवर्णनीय तर असतोच पण चिरंतर देखील असतो.

एखादी माऊली एकाग्र होऊन चटचट भाकरी थापते आणि प्रत्येक भाकरी टम्म फुगते.चुलीवरच्या त्या भाकरींचा ढीग आपण भान हरपून पहातो आणि तिच्या कौशल्याचे मनातून कौतुक करतो,किती छान वाटते आपल्याला!पण तिने हे कौशल्य आत्मसात करायला बराच वेळ घालवलेला असतो,निरीक्षण,प्रयोगातून आणि सरावातून हे कौशल्य तिला सहज प्राप्त होते. ‘Practice makes man perfect’ एखाद्या गोष्टीच्या सरावाने माणूस त्यात अव्वल होतो.

तरीही भाकरी करायला शिकण्यापासून ती परफेक्ट जमणे आणि सराव होणे ही तशी किचकटच प्रक्रिया आहे.चांगली भाकरी जमणे हे करणारीच्या हातोटीवर तर अवलंबून आहेच पण बाकीच्या गोष्टी पण त्यास कारणीभूत असतात.

खरे तर चांगल्या पिठापासूनच भाकरीची सुरुवात होते.गिरणीवर पीठ कसे दिले?यावर चांगल्या भाकरीची यशस्वीता अवलंबून असते.ज्वारी खूप जुनी असेल किंवा पावसात भिजलेली असेल तर पीठ वसवसते आणि भाकरी थापता येत नाही,कितीही पट्टीची सुगरण असली तरीही!

गिरणीत गव्हाच्या किंवा डाळीच्या दळणावर ज्वारी दळून दिली असेल तरीही भाकरी तव्याला चिकटते किंवा भाकरी डागलते.आजकाल बऱ्याच ठिकाणी ज्वारीची वेगळी आणि गव्हाची वेगळी गिरण असते त्यामुळं ती समस्या नसते मात्र ग्रामीण भागात अजूनही एकच गिरणी सगळ्या दळणाला वापरली जाते.हल्ली भाकरी गॅसवर हेंदालीयमच्या तव्यात भाजली जाते त्यामुळं भाकरीला सर्व बाजूने हवी तशी आच देऊन भाकरी चांगली करता येते.त्याचबरोबर आता पहिल्यासारखी कसलीपण ज्वारी नसते,प्रतवारीनुसार व गुणवत्तेनुसार बाजारात ज्वारी मिळते व अशा ज्वारीची  भाकरी चांगलीच होते.एकूण काय तर हल्ली चांगली भाकरी यायला फारसे कष्ट पडत नाहीत किंवा नवशिकिला भाकरी लगेचच जमू लागते शिवाय हल्लीच्या मुलींना आत्मविश्वास खूपच आहे कारण काही बिघडले,चुकले किंवा पीठ,भाकरी वाया गेली तरी घरचे रागवत नाहीत.त्यामुळं थोड्याशा सरावाने तिला चांगल्या भाकरी जमू लागतात.पण आमच्या लहानपणी आम्ही मुळाक्षरापासून शब्द शिकण्यासारखे भाकरी करायला शिकलो.

सर्वसाधारण वय वर्षे बारा किंवा अगोदरच भाकरी करायला आली पाहिजे असा अलिखित दंडक होता. स्वैपाक प्रथम, शाळा दुय्यम होती, त्यामुळं तितक्या वर्षाची मुलगी झाली की लगेच कुणीपन घरात आले की लगेच पोरीला बघून विचारायचे,’स्वैपाक पाणी येतोय की नाही अजून?’ मग येत असला की कौतुक व्हायचं, नसला येत की नावे ठेवत, त्यामुळं आपल्याला स्वैपाक आला पाहिजे ही आंतरिक हुरहूर आणि तळमळ प्रत्येकीला असायची. पण एकदम भाकरी शिकणे किंवा नुसती भाकरी येण्यालाही महत्व नव्हतं;तत्पूर्वी घरातील बारीक सारिक कामे पहिली यायला हवीत, ती अगदी पहिली दुसरीपासून सुरू होत. झाडलोट, राखकेर भरणे, भाज्या निवडणे,पाणी भरणे, चुलीपुढं जळण आणून ठेवणे, दुकानातून काहीबाही घरच्या गरजेच्या वस्तू आणणे,आई स्वैपाक करताना तिथंच बसून हाताखाली लागणाऱ्या वस्तू देणे आणि हे करतच स्वैपाकाचे म्हणजेच भाजी कशी फोडणीला टाकायची, आमटी कशी करायची, कशात काय घालायचं आणि कशात काय घालायचे नाही? याचे अचूक निरीक्षण करायचे त्याचबरोबर आई, आजी किंवा घरातील मोठी स्त्री भाकरी कशी करते हेही स्वैपाकघरात बसून बघावे लागे. यातूनच मग स्वैपाकाचे तंत्र शिकता यायचे आणि गोडीही लागायची.अधे मध्ये एखादा छोटा गोळा घेऊन भाकरी थापता येते का याचे प्रात्यक्षिक करून बघायला मिळायचे.

अचानक एखादे दिवशी कोणीतरी म्हणे,’आज भाकरीला बस.’ त्यावेळी आनंद ही होई आणि भीतीही वाटे, भाकरी जमणार का नाही? प्रथम चुलीतला जाळ एकसारखा करायचा, लोखंडी जडशीळ तवा चुलीवर ठेवायचा, त्यात उसुळला (उथवणी) भाकरीच्या अंदाजाने पाणी ओतायचे. परातीत पिठाचे गोल आळे करायचे, त्यात तव्यातलं उकळलेले पाणी ओतायचे.उलथण्याने पीठ हळुवार कालवून बाजूला सारायच. तोपर्यंत तिकडं हलक्या बोटांनी चुलीचा जाळ एकसारखा करायचा,चार काटक्या आत सारून फडक्याला बोटं पुसून पीठ मळायला सुरुवात करायची.इथंच हाताला पहिला चटका बसतो.

क्रमशः….

© सौ.सुचित्रा पवार

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रावण- दहन ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? विविधा ?

☆ रावण – दहन ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆ 

रावणाचे  मनोगत 

दसऱ्याच्या दिवशी रावणाला जाळताना हजारोंनी माणसं जमली होती. त्यामध्ये कितीतरी रावणच होते. एक दोघे राम होते पण हतबलतेने ते गप्प होते. लढवय्या राम मात्र एकही नव्हता. तो रामराज्यात फक्त सीतेच्या वाटेला आला होता. 

जळताना रावणाने मोठयाने ओरडून सांगितले—-” बघा तुमच्याच आतमध्ये डोकावून आणि करा हिशोब स्वतःच्या चारित्र्याचा.” 

हो.. हो, केला आहे मी गुन्हा सीतेच्या अपहरणाचा.– पण मी कधीच मर्यादेच्या सीमा नाही ओलांडल्या. कायम विचार केला तिच्या मानाचा. 

तुम्हीतर दिवसाढवळ्या नुसत्या वखवखलेल्या नजरेनेच अब्रूचे लचके तोडता, वर दिमाखाने मिरवत, सभ्यपणाचा बुरखा लावून मलाच जाळता. 

हो.. हो, केला आहे मी गुन्हा सीतेच्या अपहरणाचा.– पण मी कधीच विचार नाही केला तिच्या अत्याचाराचा.– निर्भयासारख्या कितीजणींना भक्ष्य केलय तू मानवा, कळस झाला आहे तुझ्या अविचाराचा.– विचार कर तुझ्यातल्या राक्षसाला जाळायचा. 

हो.. हो, केला आहे मी गुन्हा सीतेच्या अपहरणाचा– पण मी कधीच विचार नाही केला जबरदस्तीचा. 

तुझ्यासारखा तूच नीच, जो जोर दाखवितो अबलांवरती आपल्या बळाचा. जरा तरी विचार कर त्यांच्या नाजूक मनाचा. 

हो..हो, केला आहे मी गुन्हा सीतेच्या अपहरणाचा– पण मी कधीच विचार नाही केला आक्रमकतेचा. 

तू तर मान नाही राखत कुठच्याच स्त्रीचा, मानवा कधीतरी तूच खून कर तुझ्यातल्या दानवाचा. 

हो..हो, केला आहे मी गुन्हा सीतेच्या अपहरणाचा—-पण कधीच  नाही विचार केला तिच्या अपमानाचा. 

अरे मला जाळण्याआधी मानवा जरा स्वतःला विचार, हुंड्याच्या मोहापायी तू किती सीता जाळल्या आणि वंशाच्या दिवट्यासाठी गर्भात किती कळ्या मारल्या. 

हो..हो, केला आहे मी गुन्हा सीतेच्या अपहरणाचा— पण कधीच नाही विचार केला बीभत्सपणाचा.– 

तुम्ही तर करता चुराडा, न उमललेल्या फुलांचा आणि त्यांच्या भावी स्वप्नांचा. 

मानवा लाज बाळग नाव घ्यायला मर्यादा पुरुषाचे.

मानवा लाज बाळग नाव घ्यायला मर्यादा पुरुषाचे.—

कधी न कधी तुलाही भोगायला लागेल फळ आपल्या कर्माचे.

हो.. हो..शंभरदा सांगेन, हो.. हो.. हो. शंभरदा सांगेन,– केला आहे मी गुन्हा सीतेच्या अपहरणाचा —-कारण मला रामाकडूनच पाहिजे होता मोक्ष मानाचा. 

मानवा तूच प्रयत्न कर स्वतःचे चारित्र्य सुधारण्याचा, मला जाळताना विचार कर–

स्वतःतला मी जाळण्याचा. 

स्वतःतला मी जाळण्याचा. 

स्वतःतला मी जाळण्याचा. 

रावणाच्या मनोगताला दिलेले मानवाचे उत्तर 

(दसऱ्याच्या दिवशी जळताना रावणाने मोठयाने ओरडून दिले स्पष्टीकरण आपल्या गुन्ह्याचे,  आणि मानवाला विचार करायला लावत  सांगितले-’ स्वतःतला मी जाळायला ‘-) 

त्यावर मानवाचे उत्तर ——–

हो.. हो, आहेत रावणा आमच्यामध्ये, वखवखलेल्या नजरेनेच अब्रूचे लचके तोडणारे,—-

पण त्याहूनही जास्त जण आहेत आपल्या जरबी नजरेनेच,  त्या समाजकंटकांना वठणीवर आणणारे.—- 

हो.. हो, आहेत रावणा आमच्यात, काही निर्भयासारख्याना भक्ष्य करणारे—- 

पण त्याहूनही कितीतरी जण आहेत त्यांच्यासारख्या राक्षसांना लक्ष्य करणारे.—-  

हो.. हो, आहेत रावणा आमच्यात, काही जण अबलांवरती जबरदस्ती करणारे—–

पण अनेक जण आहेत स्वतःच्या बळावरती, त्यांना फाशी देऊन जमीनदोस्त करणारे—- 

हो. हो, आहेत रावणा आमच्यात, काहीजण स्त्रीचा अपमान करणारे,—-

पण अनेक भारतपुत्र आहेत, सीमेवर आमच्याच माय लेकींची रक्षा करणारे—-

रावणा तू नको विचार करूस, 

रावणा…… तू नको विचार करुस—-  

आमच्यात राहून तुझ्या नातलगांनी हुंडयापायी किती सीता जाळल्या आणि गर्भात किती कळ्या मारल्या—–

त्याही पेक्षा जास्त आम्ही कितीतरी सीता वाचवल्या आणि उमलत्या कळ्यांना लक्ष्मी मानल्या.—-

रावणा,२६/११ च्या हल्ल्यात तुझ्यासारख्याच नराधमानी निरागसांचा नरसंहार केला—- 

तेव्हा आमच्यातल्याच असंख्य रामांनी सामोरे जाऊन त्यांचाच खात्मा केला—– 

रावणा लाज बाळग, 

रावणा लाज बाळग—-

स्वतःच्या गुन्ह्याची कबुली देऊन, वर गमज्या मारतोस—

सीतेच्या अपहरणाचा गुन्हा करून–

मोक्ष रामाकडून मानाचा मागतोस—- 

तुझ्यासारख्या असंख्य रावणांना मारायला आता नाही गरज आमच्यातल्या रामाची,

तुझ्यासारख्या असंख्य दानवांना जाळायला आता—-

झाली आहे नजर सक्षम— सीतेची.

झाली आहे नजर सक्षम— सीतेची.

झाली आहे नजर सक्षम— सीतेची.

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

मो. नं. ९८९२९५७००५. 

ठाणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उदे ग अंबे उदे भाग ३ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? विविधा ?

☆ उदे ग अंबे उदे  भाग ३ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागील भागा. दसरा हा देवीच्या विजयोत्सवाचा दिवस. भागात आपण पहिले – . दसरा हा देवीच्या विजयोत्सवाचा दिवस. )

या घटनेचा किंवा  पुराणकथेचा, मिथकाचा, लौकिक व्यवहाराशी अनुबंध कसा जोडला जातो,  तेही पहाणे योग्य होईल. नवरात्रात अनेक घरातून कुलाचार असा आहे, की नवरात्राच्या आदल्या दिवशी देवांची पूजा करून ते पेटीत,  डब्यात घालून ठेवतात. पुढे नऊ दिवस देवांची पूजा केली जात नाही. त्याचे कारण एकीला विचारले असता कळले, की देव या काळात तपश्चर्येला बसलेले असतात, म्हणून त्यांना हलवायचे नाही. त्यासाठी त्यांची पूजा करायची नाही. म्हणजे ते हलवले, तर त्यांच्या तपश्चर्येत विघ्न येईल. ‘आता देव बसणार’, वा ‘देव बसले’ असा शब्दप्रयोग व्यवहारात अनेकदा ऐकला होता, पण त्याचा खरा अर्थ तेव्हा कळला.

महिषासुरमर्दिनीने अहोरात्र नऊ दिवस महिषासुराशी युद्ध करून, त्याला आणि धूम्रवर्ण,  शंभु-निशुंभ इ. अनेक दैत्यांचा वध करून स्वर्ग आणि पृथ्वी भयमुक्त केली, पण लोकाचार बघितला, तर लक्षात येतं,  की नवरात्रोत्सव हा देवीच्या केवळ शक्तिरुपाचा उत्सव नाही. तो तिच्या मातृरुपाचा,  तिच्या सृजन शक्तीचाही उत्सव आहे.   नवरात्रात अनेक घरातून देव बसतात,  म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे तपश्चर्येलाबसतात. त्या काळात त्यांची पूजा होत नाही. पण त्याचवेळी अनेक घरातून विशेषत: कृषीसंस्कृतीशी संबंधित घरातून घटस्थापना केली जाते. म्हणजे पत्रावळीवर माती पसरून त्यात नवविधा बियाणे रुजत घातले जाते. वर मातीचा घट ठेवून त्यात पाणी घातले जाते. शेजारी दिवा ठेवला जातो. त्यावर रोज एक फुलांची माळ चढवून घटाची पूजा केली जाते. हे म्हणजे भूदेवीची पूजा,  उपासना असते. इथे घरात प्रतिकात्मक शेतच तयार केले जाते. घट हा पाण्याच्या स्त्रोताचे प्रतिक आहे, तर दिवा सूर्याचे. पीक उगवून येण्यासाठी माती,  पाणी,  सूर्यप्रकाशाची गरज असते. ते इथे प्रतिकात्मक स्वरुपात आणले जाते. मातीच्या घटातील पाणी पाझरते. बियाणे रुजतात. अंकुरतात. हळूहळू वाढू लागतात. दसर्‍याच्या दिवशी सोने म्हणून ते अंकूर कापून सोने म्हणून देण्याची प्रथा अनेक घरातून आहे. कृषी संस्कृतीचे धान्य हेच धन,  हेच सोने नाही का? या प्रथेप्रमाणे लक्षात येते,  नवरात्रातील देवीचा उत्सव हा तिच्या मातृरुपाचा उत्सव असतो.

आई जन्मदात्री असते. पालनकर्ती,  रक्षणकर्तीही असते. घटस्थापनेच्या रुपाने तिच्या सृजन शक्तीची उपासना केली जाते. ती पालनकर्तीही असते. नवरात्रात विविध पक्वान्ने केली जातात,  आणि शरिराचे पोषण अधीक अस्वाद्य रुपात होते. पण पोषण केवळ शरिराचेच होऊन भागणार नाही. मनाचेही व्हावयास हवे. नवरात्रीच्या निमित्ताने भजन, कीर्तन, प्रवचन,  व्याख्याने,  गीत-नृत्य,  तसेच अनेकविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या सार्‍यातून मनाचे पोषण होते. व्यक्तिमत्वाचा विकास होतो. आई रक्षणकर्ती असते. शत्रू नेहमी बाहेरचेच असतात,  असे नाही. आपले स्वभाव दोष हेही आपले शत्रूच. खोटे बोलणे,  अहंकार,  द्वेष,  मत्सर असे किती तरी स्वभावदोष आपले व्यक्तिमत्व काजळून टाकतात. आपल्या मुलात हे दोष रुजू, वाढू नयेत,  म्हणून आई प्रयत्नशील असते. मुलांना प्रसंगी रागावूनसुद्धा त्यांच्यातील असले दोष दूर करण्याचा प्रयत्न करते.  नवरात्रातील भजन, कीर्तन, प्रवचन, व्याख्याने, इत्यादीं मधून देखील त्याची शिकवण दिली जाते. सुसंस्कार करण्याचा प्रयत्न होतो.

अशा तर्‍हेने जन्मदात्री,  पालनकर्ती,  रक्षणकर्ती या तिन्ही दृष्टीने नवरात्रातील देवीची उपासना ही तिच्या मातृरुपाचीही उपासना असते. नवरात्रात अनेक घरातूनपिठा-मिठाचा जोगवा मागायची चाल आहे. एकनाथांनी एक अतिशय सुंदर रुपकात्मक ‘जोगवा’ लिहिला आहे. नि:संग होऊन वारीला निघालेली ही देवीची उपासक वर सांगतलेले स्वभाव दोष त्यजून वारीला कशी जाते, हे बघण्यासारखे आहे. त्यांनी लिहिले आहे,

अनादि निर्गुण प्रगटली भवानी । मोहमहिषासुरमर्दनालागुनी।

त्रिविध तापाची करावया झाडणी । भक्तालागी तू पावसी निर्वाणी।

☆ ☆ ☆ ☆ ☆ 

नवविध भक्तीचं भक्तीचं नवरात्र ।  धरोनी सद्भाव अंतरीचा मित्र।

ओटी भरोनी मागेन ज्ञानपुत्र । दंभ सासरा सांडेन कुपात्र ।।

आता मी साजणी झाले गे नि:संग। विकल्प नवर्‍याचा सोडियेला संग।

केला मोकळा मारग सुरंग । आईचा जोगवा जोगवा मागेन ।।

समाप्त

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! मोरूचा आगाऊ दसरा ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? ? मोरूचा आगाऊ दसरा ?

“नमस्कार पंत !”

“नमस्कार, नमस्कार ! काय रे मोरू, आज बरेच दिवसांनी शुक्राची चांदणी…..”

“काय पंत, मी तुम्हाला चांदणी वाटलो की काय ?”

“सॉरी सॉरी मोरू, अरे पेपर मधे तो आपला चांदणी बार……”

“आपला चांदणी बार ?”

“अरे तसं म्हणायची एक पद्धत असते मोरू, आपला या शब्दाचा अर्थ तसा शब्दशः घ्यायचा नसतो !”

“ते माहित आहे मला, पण तुमच्या त्या चांदणी बारच काय ?”

“मोऱ्या, माझा कुठला आलाय चांदणी बार, आम्ही सगळे…… “

“अरे हो, मी विसरलोच पंत, तुमचे ‘खाऊ पिऊ मजा करू’ हे पेन्शनरांचे मित्र मंडळ दर महिन्याला वेगवेगळ्या बार मधे जाते ना !”

“अरे हळू बोल गाढवा, हिच्या कानावर गेलं, तर आत्ता दिवसा ढवळ्या मला चांदण्या दाखवायला कमी करणार नाही ही !”

“ओके, पण त्या चांदणी बारच काय सांगत होतात तुम्ही पंत ?”

“काही नाही रे मोरू, त्या बारची एक बातमी आली आहे पेपरात, ती वाचत असतांना नेमका तू टपकलास, म्हणून चुकून तुला चांदणी म्हटलं एव्हढच !”

“कसली बातमी पंत, हॅपी अवर्सचा टाइम वाढवला की काय ?”

“मोरू एक काम कर, आता घरी जाताना हा पेपर घेवून जा आणि सावकाश चांदण्या बघत… सॉरी सॉरी.. सावकाश सगळ्या बातम्या वाचून, संध्याकाळी आठवणीने तो परत आणून दे ! आणि आता मला सांग इतक्या दिवसांनी, सकाळी सकाळी शुचिर्भूत होऊन किमर्थ आगमन ?”

“काही नाही पंत, सोनं द्यायला आलो होतो !”

“कमाल आहे तुझी मोरू, तू दुबईला गेलास कधी आणि आलास कधी ? चाळीत कोणाला पत्ता नाही लागू दिलास !”

“तसं नाही पंत, मी काय म्हणतोय ते जरा…. “

“आणि तुझ ही बरोबरच आहे म्हणा, तिकडे जायला वेळ तो कितीसा लागतो, फक्त अडीच तासाचा काय तो प्रवास ! अरे इथे हल्ली लोकांना दादर ते वाशी जायला तीन….. “

“पंत, सोनं काय फक्त दुबईला मिळत ?”

“तसंच काही नाही, पण दुबईला स्वस्त असतं असं म्हणतात आणि सध्या IPL पण चालू आहे ना, म्हणून म्हटलं तू एका दगडात दोन….. “

“पंत, खरं सोनं देण्या इतका मी अजून ‘सुरेश अंधानी’ सारखा श्रीमंत नाही झालो !”

“आज ना उद्या होशील मोरू, माझे आशीर्वाद आहेत तुझ्या पाठीशी !”

“पंत, नुसते आशीर्वाद असून चालत नाहीत, त्यासाठी कापूस  बाजारात उभे राहून, सूत गुंड्या विकणाऱ्या बापाच्या पोटी, मोठा मुलगा म्हणून जन्मावं लागत, त्याला एक धाकटा निक्कमा भाऊ असावा लागतो, जो परदेशातल्या भर कोर्टात हात वर करून, मी कफल्लक आहे, असं अर्मानी सूट बूट घालून छाती ठोक पणे सांगू शकेल आणि…. “

“अरे मोरू, तू सोन्या वरून एकदम अँटिलीया… सॉरी सॉरी… भलत्याच सत्तावीस मजली अँटिनावर चढलास की !”

“पंत, आता तुम्ही विषयच असा काढलात, मग मी तरी किती वेळ …. “

“बरं बरं, पण तू ते सोनं का काय ते…. “

“हां पंत, हे घ्या सोनं, नमस्कार करतो !”

“मोरू, अरे ही तर आपट्याची पानं, यांना सोन्याचा मान दसऱ्याच्या…… “

“दिवशी, ठावूक आहे मला पंत !”

“आणि अजून नवरात्र यायचे आहे, संपायचे आहे आणि तू आत्ता पासूनच हे का वाटत फिरतोयसं ?”

“अहो पंत, त्या दिवशी यांची किंमत खऱ्या सोन्यापेक्षा कितीतरी जास्त असते ना, म्हणून !”

“धन्य, धन्य आहे तुझी मोरू !”

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उदे ग अंबे उदे भाग २ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? विविधा ?

☆ उदे ग अंबे उदे  भाग २ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

 ( मागील भागात आपण पहिले –  तिथे जाऊन त्यांनी विष्णू हाच हविर्भागदेण्यासाठी योग्य आहे,  असे सांगितले. तेव्हापासून भक्तवत्सलांछनहे बिरुद विष्णूदेवाने अलंकाराप्रमाणे मिरवले आहे. आता इथून पुढे )

भृगुऋषी निघून गेले, पण लक्ष्मीला मात्र त्यांच्या वर्तनाचा राग आला. ती म्हणाली, ‘तुमच्या हृदयातील माझ्या निवासावर,  आलिंगन स्थानावरच त्यांनी लाथ मारली. हा माझा घोर अपमान आहे. तुम्ही त्यांना काहीही न बोलता, त्यांचे आगत-स्वागत केलेत. पण मला हे सहन होत नाही. मी आपल्या सान्निध्याचा व या वैकुंठाचा त्याग करून, परमदिव्य अशा महाक्षेत्री करविरास ( म्हणजेच  कोल्हपुरास) जाते. विष्णूने तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण तिने ऐकले नाही. ( देव-देवताही माणसांसारख्याच रुसतात,  फुगतात तर! – देव,  दानवा नरे निर्मिले – केशवसुत ).

पुढचा कथा भाग असा,  लक्ष्मी गेल्यानंतर विष्णूला चैन पडेना. तिच्या लाभासाठी त्याने दहा वर्षे तपश्चर्या केली. मग नंतर आकाशवाणी झाली, की सुवर्णमुखरी नदीच्या उत्तर तिरावर तपोभूमी तीर्थ स्थापन कर. तिथे देवलोकातील दिव्य कमळे,  नाना परिमळाचे वृक्ष लाव. तिथे १२ वर्षे तप कर. त्याप्रमाणे विष्णूने सरोवर निर्माण केले. वृक्ष लावले व तपश्चर्या केली. तिथे पद्मतीर्थात लक्ष्मी प्रगटली. तीच पदमवती होय. तिने कल्हार (कृष्णकमळ) फुलांची माळ विष्णूच्या गळ्यात घातली. विष्णूने त्यानंतर पुष्करणी जवळिल शेषाचलावर वस्तव्य केले. हे पुढे वेंकटगिरी या नावाने प्रसिद्धीस आले. इथे वेंकटेशाच्या हृदयावर लक्ष्मीची मूर्ती आहे, पण त्याच्याशेजारी ना लक्ष्मी आहे, ना पद्मावती. पद्मावतीचे  मंदीर खाली सरोवराजवळ आहे. लक्ष्मीचा निवास कोल्हापुरी आहे. त्यामुळे कोल्हापूर हे वैष्णव क्षेत्रही झाले. जनमानसावरील हा ठसा स्पष्ट आणि गडद होण्याच्या दृष्टीने,  पुढे नवरात्रात तिरुपती देवस्थानहून महालक्ष्मीसाठी किती तरी लाखांचे शालूही येऊ लागले. ही प्रथा कधीपासून सुरू झाली, हेही अभ्यासकांनी अभ्यासायला हरकत नाही.

सर्वसामान्य श्रद्धाळू भाविकांच्या दृष्टीने मात्र देवी जगदंबा,  मग ती पार्वती असो,  की लक्ष्मी,  जगाची माता आहे. शक्तिमान आहे. भक्तांच्या  मनोकामना  पूर्ण करणारी आहे. दुष्टांचे निर्दाळण करणारी आहे. एवढेच त्यांना पुरेसे असते.

देवीने अनेक असुरांचा नाश केला. शुंभ-निशुंभ, धूम्रवर्ण, रक्तबीज आणखी किती तरी… देवी महात्म्यात त्याचे वर्णन आहे. प्राचीन काळी कोलासुर नावाचा दैत्य स्त्रियांना फार त्रास द्यायचा. तेव्हा सर्व स्त्रियांनी ब्रह्मा, विष्णू, महेश यांची प्रर्थना केली. मग त्यांनी कोलासुराचा नाश करण्याचे कार्य महालक्ष्मीवर सोपवले. महालक्ष्मीने कोलासुराला मारून लोकांना संकटमुक्त केले. या घटनेवरून त्या नगरीला कोल्हापूर हे नाव प्राप्त झाले. कोलासुर म्हणजे रानडुक्कर. ते शेतीची नासधूस करते. देवीने त्याला मारून शेतीचे रक्षण केले. म्हणून महालक्ष्मी ही समृद्धीची देवताही मानली जाते.

दुर्गा, महिषासुरमर्दिनी हेही त्या महालक्ष्मीचेच रूप. त्याबद्दल अशी कथा सांगितली जाते, की देव-दानवांचा संग्राम झाला. त्यात असुरांचा जय झाला. असुरांचा राजा महिषासुर इंद्र झाला. त्याने देवांचे अधिकार हिरावून घेतले. देव दीन झाले. ते ब्रह्मदेवाकडे गेले व त्याच्यासह शंकर आणि विष्णू यांच्याकडे गेले.  ते ऐकून शंकर क्रोधित झाले. त्यांच्यामुखापासून तेज निघाले, तसेच सर्व देवांच्या मुखातून तेज निघाले.  ते तेज एकत्र झाले. ते तेज एकत्र मिळून एक नारी झाली. पुढे देवी महात्म्यात म्हंटले आहे, ‘तीच भवानी जगदंबा । त्रैलोक्याची जननी अंबा । जी हरिहराते स्वयंभा। उत्पन्न करिती जाहली । म्हणजे, जिने देवांना उ्पन्न केले,  त्यांच्या तेजापासून तिनेभक्तकार्यासाठीपुन्हा अवतार घेतला, असे वर्णन आहे. शंकराच्या तेजापासून तिचे मुख झाले. यमाच्या तेजापासून केस,  विष्णूच्या तेजापासू नबाहू,  अशाप्रकारे विविध देवांच्या तेजापाससून तिचे विविध अवयव बनले. नंतर  सतत नऊ दिवस व नऊ रात्री तिने महिषासुर व असुर सैन्याशी युद्ध केले आणि महिषासुराचा व सर्व असुर सैन्याचा वध केला आणि देवांना आणि पृथ्वीला असुरांच्या तावडीतून मुक्त केले. या कालावधीत देवही तपश्चर्येला बसले होते. आपल्या तपाचे पुण्य त्यांनी देवीला अर्पण केले. अखेर नऊ दिवस आणि नऊ रात्रींच्या तुंबळ युद्धानंतर महिषासुराचा वध झाला. दसरा हा देवीच्या विजयोत्सवाचा दिवस.

क्रमशः......

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उदे ग अंबे उदे  भाग १ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? विविधा ?

☆ उदे ग अंबे उदे  भाग १ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

अश्विन महिना लागला, की शुद्ध प्रतिपदेपासून  नवमीपर्यंत नऊ दिवस, आणि हो, नऊ रात्रीसुद्धा नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू होते. नवरात्रोत्सव हा देवीचा उत्सव. महाराष्ट्रातीलच नव्हे, तर अखील भारतातील देवीस्थाने गजबजून जातात. देवीच्या मंदिरातून श्रद्धाळू भाविकांची अपार गर्दी उसळते. ‘उदे ग अंबे  उदे’  म्हणत देवीच्या उदयाची आकांक्षा बाळगली जाते. तिला आवाहन केलं जातं.

आदिशक्तीच्या मातृस्वरुपाला अंबा,  जगदंबा़, किंवा अंबाभवानी म्हणतात. याच शक्तीने, प्रकृतीने,  निर्गुणाला चेतवून अखंड ब्रह्मांडाची निर्मिती केली. तीच जन्मदात्री,  धात्री, पालनकर्ती आणि रक्षणकर्तीही. हीच महालक्ष्मी,  महासरस्वती,  महाकाली या रुपांनी त्रिविध आणि त्रिगुणात्मक बनते. तिची नाना रुपे आहेत. तिला नाना नावांनी ओळखले जाते. तिची स्थाने जशी अनेक आहेत, तशीच तिच्याठायी मानवी मनाने वेगवेगळी सामर्थ्ये कल्पिली आहेत. भवानी,  रेणुका,  चामुंडा,  शांतादुर्गा,  पद्मावती, संतोषी, जोगेश्वरी,  शाकांबरी  ही त्यापैकीच काही नावे.

महालक्ष्मी हे जगदंबेचेच एक रूप आहे. महाराष्ट्रात कोल्हापूर,  मुंबई,  केळशी,  आडिवरे, कुडाळ, वाई इ. ठिकाणी महालक्ष्मीची मंदिरे आहेत,  तथापि कोल्हापुरातील महालक्ष्मीच्या स्थानाचे महात्म्य खूप आहे. तिच्या नावाने पिठा-मिठाचा जोगवा’ मागत कोल्हापूरला जाताना भाविक महिला म्हणतात,

‘कोल्हापूरवासिनी ग अंबे दे दर्शन मजसी

तुझ्या कृपेने जाती लयाला पापांच्या राशी’

आपल्याला पिठा-मिठाचा जोगवा’ सत्वर’ घालायला ती सांगते. कारण तिला दूरवर कोल्हापूरला जायचय. देवीला बांगड्या,  हार-गजरे अर्पण करायचेत. साडी-चोळी नेसवून खण-नारळाने तिची ओटी भरायचीय. ती सौभाग्याची देवता आहे,  असा स्त्रियांचा विश्वास आहे. लोकमानसात हे विचार,  संस्कार,  श्रद्धा,  भावना खूप खोलवर रुजलेल्या आहेत.

कोल्हापूरवासिनी अंबाबाई, हे पार्वतीचं रूप, की लक्ष्मीचं, याबद्दल अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत. पुराणकथा व अन्य ग्रांथिक आधार बघितले, तर ती शिवाची पार्वती आहे, तसेच विष्णूची लक्ष्मीही आहे, असे सांगणार्‍या कथा आपल्याला वाचायला मिळतात.

कोल्हापूर हे आद्य आणि महत्वाचं शक्तिीपीठ आहे. महत्वाच्या साडेतीन पीठातील ते पहिले महत्वाचे पीठ. या शक्तिपीठांबद्दल अशी कथा सांगितली जाते, की दक्ष प्रजापती आणि असिक्वीनी यांना जगदंबेच्या वरदानाने सती नावाची एक सर्वज्ञ व अवतारी कन्या झाली. तिने शंकराशी विवाह केला. दक्षाला ते पसंत नव्हते. पुढे दक्षराजाने एक यज्ञ केला. त्यात सतीचा अपमान झाला, म्हणून तिने यज्ञवुंâडात उडी घेतली. त्यामुळे शंकर संतप्त झाला. त्याने यज्ञकुंडातून अर्धवट जळलेले निष्प्राण शरीर बाहेर काढले व ते खांद्यावर टाकून त्याने तांडव सुरू केले. त्यामुळे सगळी पृथ्वी भयभीत झाली, तेव्हा नारायणाने शिवालायातून बाहे काढण्यासाठी आपल्या सुदर्शन चक्राने व धनुष्यबाणाने मागच्यामागे सतीच्या देहाचे अवयव तोडण्यास सुरुवातकेली. या पवित्र देहाचे अवयव पृथ्वीवर १०८ ठिकाणी पडले. तिथे  तिथे शक्तिपीठे निर्माण झाली. कोल्हापूर (किंवा  पूर्वी यालाच करवीर नगरी म्हणत) इथे सतीच्या हृदयापासूनचा वरचा भाग पडला. सर्व अवयवात मस्तक हे प्रधान,  त्यामुळे सर्व शक्तिीपीठात कोल्हापूर हे सर्वोच्च व आद्य शक्तिपीठ मानले जाते. दुसरे शक्तिपीठ म्हणजे तुळजापूरची भवानी. तिसरे म्हणजे माहूरची रेणुका व अर्धे पीठ म्हणजे वणीची सप्तशृंगनिवासिनी.

कोल्हापूरवासिनी अंबाबाई, हे लक्ष्मीचं, रूप आहे,  असं सांगणारी कथाही पुराणातआहे. एकदा काश्यपऋषी यज्ञ करत असताना, त्याचा हविर्भाग कुणाला अर्पण करणार असे नारदाने विचारले,  असता कोणती देवता यासाठी योग्य, असा विचार सुरू झाला. मग ते ठरण्याची जबाबदारी भृगु ऋषींवर टाकण्यात आली. ते प्रथम ब्रह्मलोकी गेले. नंतर कैलासावर शंकराकडे गेले, पण या दोघांनीही त्यांची दखल घेतली नाही. ते रागावून वैकुंठाला गेले. तिथेही विष्णू-लक्ष्मी बोलत होते. त्यांचे  काही भृगुऋषींकडे लक्ष गेले नाही. ते संतापले आणि  त्यांनी विष्णूच्या छातीवर लाथ मारली. पुढे विष्णुचे त्यांच्याकडे लक्ष गेले. त्यांनी ऋषींचे स्वागत केले आणि म्हणाले, ‘आपल्यासारख्या महात्म्याचे दर्शन मोठ्या पुण्याईने होते. माझ्या खडकासारख्या छातीवर लाथ मारल्याने आपले पाऊल दुखावले तर नाही ना?  बोला मीआपले काय प्रीयकरू?’ त्यांचा हा दिव्य भाव पाहून भृगुऋषींचा राग पळून गेला. त्यांनी आपल्या पावलाचे चिन्ह कायमचे छातीवर धारण करायला सांगितले व ते मृत्यूलोकी निघून गेले व तिथे जाऊन त्यांनी विष्णू हाच हविर्भागदेण्यासाठी योग्य आहे,  असे सांगितले. तेव्हापासून’ भक्तवत्सलांछन’ हे बिरुद विष्णूदेवाने अलंकाराप्रमाणे मिरवले आहे.

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्त्रियांमधील नवदुर्गेची रूपं ☆ सौ. मंजुषा सुधीर आफळे

सौ.मंजुषा सुधीर आफळे

?  विविधा ?

☆ स्त्रियांमधील नवदुर्गेची रूपं☆ सौ. मंजुषा सुधीर आफळे ☆ 

आजपासून नऊ दिवस, नऊ रात्री जगद्जननी, “जगदंबा” मातेचा उत्सव सुरू होत आहे. सर्वत्र तिच्या विविध रूपांची खूप श्रद्धेने पूजा केली जाते. सुमधुर स्तुति स्तोत्र गात तिला प्रसन्न करून घेऊ या. शिवशक्तीच्या कृपेनेच या विश्वात सर्व प्राणीमात्रांचा संसार सुरू आहे. तिचा गौरव, जागर करण्याने सर्वत्र नवाचेतना जागृत होते. त्यामुळे या पूजे कडे डोळसपणे पाहू या. नऊ दिवसांसाठी नऊ आदर्श संकल्प करू या. व ते सिद्धीस नेण्याचा मनापासून प्रयत्न करू या.

१) आपल्या आसपास कितीतरी सुबोध, सगुण संपन्न, सुविचारी, प्रेमळ स्त्रिया विविध क्षेत्रात वावरताना दिसतात. त्यांच्या गुणांचा गौरव करण्याचा निश्चय करू या. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊ या.

२) प्रत्येक स्त्री मध्ये माता पार्वती अंश रूपात सामावली आहे. याचा कधीही कोणत्याही स्त्रीला विसर न व्हावा.असा प्रयत्न करू या.

३)पीडित महिलांना त्यांच्या जीवन प्रवासात सोबत करू या. योग्य मार्गक्रमण, करण्यासाठी प्रोत्साहन देऊ या. धीर देऊ या.

४)वृद्ध स्त्रियांना हळुवार आधार देऊन, आनंदाने त्यांची सेवा करू या.

५) कुमारिकांच्या डोळ्यांतील सुंदर स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत करू या.

६) कष्टकरी महिलांना प्रेम व सन्मान देऊ या. त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊ या. त्यांचा आत्मविश्वास वाढवू या.त्यांना आधार देऊ या.

७)गुरुस्थानी असलेल्या महिलां कडून चार चांगल्या गोष्टी शिकून घेऊ या.

८)निरागस मैत्रिणींच्या, बहिणींच्या प्रेमळ हाकेला प्रतिसाद देऊ त्यांची प्राधान्याने सोबत करू या.

९)विविध क्षेत्रात सर्वोच्च पातळीवर कार्यरत असणाऱ्या असणाऱ्या स्त्रियांचा जीवनप्रवास अभ्यासू या.इतिहास समजून घेऊ या.

मैत्रीणींनो, प्रत्येक दिवशी अशी पूजा बांधून नवरात्रीचा नंदादीप अखंड तेवत ठेवू या. मग, नक्कीच सरतेशेवटी नवरात्र आपल्या स्वतःमध्येच आमूलाग्र सकारात्मक बदल घडवून आणेल. ज्यामुळे आपण नव विचारांना अंगीकारण्यात आनंदाने व उत्साहाने सिद्ध होऊ. म्हणजे खऱ्या अर्थाने नवरात्र पूजा सुफळ संपूर्ण होईल.असा आज विश्वास वाटतो.

 

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

७/१०/२०२१

विश्रामबाग, सांगली.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नवरात्र उत्सव ☆ प्रा. विजय जंगम

⭐ विविधा ⭐

⭐ नवरात्र उत्सव ⭐  प्रा. विजय जंगम⭐ 

भारतीय वर्षा मधील नवरात्र उत्सव…  दसरा..हा सण विशेष महत्वाचा सण समजला जातो. आपला देश शेतीप्रधान देश या नावाने ओळखला जातो. म्हणून , आपली भारतीय संस्कृती ही शेती प्रधान संस्कृती समजली जाते. त्यामुळे आपण जे सण साजरे करतो,  त्या सणांच्या मूळाशी प्रामुख्यानं पर्यावरण, निसर्ग आणि हवामानाचा विचार केलेला आहे. या व्यतिरिक्त हे सण कोणत्या तरी पौराणिक, धार्मिक आणि सामाजिक कथांशी , विचारांशी जोडलेले असल्याने ,ते साजरे करण्यामागे पारंपरिक श्रध्दा निर्माण झालेली आहे. म्हणूनच या सणांची आपणाला आपूर्वाई असते.

काल पासून सुरू झालेला नवरात्र उत्सव हा या सगळ्यांचंच प्रतिक आहे. हा उत्सव प्रामुख्याने स्त्री शक्तीची थोरवी सांगणारा आहे. महिषासुराशी नव दिवस युद्ध करून त्याचं मर्दन करणारी देवी ही साक्षात किती सबला आहे , याचं उदाहरण तमाम स्त्री वर्गाला प्रेरणादायी ठरेल याची खबरदारी आपल्या पूर्वजांनी घेतली आहे.

हा सण साजरा करताना , निसर्गाला किती प्रमाण मानले आहे , हेही आपल्या लक्षात येते. त्याचबरोबर आप ,तेज ,वायू , आकाश आणि अग्नी या पंचमहाभूतांचाही किती खुबीने वापर केला आहे हे सुद्धा समजून येते.

नवरात्र उत्सवाची सुरुवात घटस्थापनेने होते. हा घट म्हणजेच आकाश तत्व आहे. त्या घटात पाणी भरून ठेवले जाते .ते जल तत्व.घटा खाली काळी माती पसरली जाते .ते भूमी तत्व . त्या मातीत धान्य टोकलं जातं . तो त्या भूमीचा रजोगुण . नवरात्रात अखंड नंदादीप तेवत असतो. ते अग्नी तत्व. त्या घाटावर पिवळ्या फुलांची माळ रोज वाहिली जाते. पिवळा रंग हा रजोगुण आहे.

अशी नव दिवस पुजा करून , खंडे नवमीला शस्त्रांची म्हणजेच शेती अवजारांची पूजा केली जाते.शेवटी दशमीला शमी वृक्षाची , म्हणजेच आपट्यांची पानं सोन्याच्या मोलानं वाटली जातात. एका वृक्षाच्या पानांनां सोन्याची किंमत देणारा भारत देश जगात एकमेव देश असावा. आणि त्या देशात साजरे केले जात असलेले सणही त्याच किंमतीचे असावेत ,यात शंकाच नाही.

 

© प्रा. विजय जंगम

सांगली 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares