मराठी साहित्य – विविधा ☆ सावळी….सावळी ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

☆ विविधा ☆ सावळी….सावळी ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

परवाच सुधीर मोघे यांचे ‘गाणारी वाट’ हे पुस्तक वाचनात आले. त्यांच्या चित्रपट- मालिका लेखनातील गीतांचा प्रवास यामध्ये आहे. त्यातील एका गाण्याचा प्रवास वाचताना मी पुन्हा नकळत त्या गाण्यात गुंतून गेले-“सांज ये गोकुळी सावळी सावळी….” !

वास्तविक हे गाणे श्रीधर फडक्यांनी आपल्या एका कार्यक्रमासाठी सुधीर मोघ्यांकडून लिहून घेतले. बाकी बरीचशी गाणी गदिमा नी सुधीर फडक्यांसाठी लिहिली होती, पण ती स्वरबद्ध झाली नव्हती. ती चालीत बांधून त्याचा एक कार्यक्रम श्रीधरजीनी तयार केला होता. त्यातील एक गाणे प्रभातीचे रंग दाखवणारे होये. त्याच्या जोडीला म्हणून हे एक गाणे शामरंगावर तयार झाले. संगीत श्रीधर फडके आणि गायिका आशा भोसले! या त्रयींनी एक अजरामर कलाकृती निर्माण केली.

नंतर अनेक वर्षांनी हे गाणे ‘वजीर ‘ या चित्रपटात घेतले व अश्विनी भावे या गुणी अभिनेत्रीवर चित्रित झाले. चित्रपटाच्या सुरुवातीलाच हे गाणे येते. पुढच्या संकटाची कसलीच चाहूल नसलेली ही युवती या शामरंगात आकंठ बुडालेली दिसते.

सूर्य अस्ताला टेकला आहे आणि अंधार दाटून आला आहे. कवीने अशी कल्पना केली आहे की ही गोकुळातील संध्याकाळ आहे. त्यामुळे त्या सावळ्या कान्ह्याच्या रंगासारखीच ती सावळी आहे, जणू काही त्याचीच सावली वाटावी. दिवसभर रानात चरत असणाऱ्या गाई आता घरच्या आणि वासराच्या ओढीने खुराने धूळ उडवत अंधाऱ्या होत चाललेल्या वाटेवरुन धावत आहेत. त्यांच्याबरोबर पाखरांचे थवे सुद्धा घरट्यात परतत आहेत. आणि त्याचवेळी दूरवर कोण्या एका देवळात सांजवात लावून घंटानाद होत आहे. दूरवर दिसणारी पर्वतरांग सूर्याचा अस्त होताना काळ्या रंगात बुडून जाते आहे. जणू काही या सर्व संध्येला दृष्ट लागू नये म्हणून निसर्गाने रेखलेली ही काजळाची दाट रेघ आहे.

पुढे कवी या सावळ्या- शामवर्णाच्या रंगात इतका बुडून गेला आहे की त्याला डोहातले चांदणे पण सावळेच दिसू लागते, कारण आजूबाजूला त्या नटखट सावळ्याची चाहूल आहे.

पुढच्या ओळी म्हणजे कवीच्या प्रतिभेचा आणि त्या कवितेतील संकल्पनेचा चरम बिंदू आहे असे मला वाटते-

“माऊली सांज अंधार पान्हा”- ही सावळी संध्याकाळ म्हणजे एक माता आहे आणि ती अंधार पान्हवते आहे. त्यामुळे त्या कृष्णवर्णाने  हे संपूर्ण विश्वच व्यापून राहिले आहे, जणू काही ते त्या सावळ्या कान्ह्याचे दुसरे रुपच आहे.

असा तो कान्हा वाऱ्याच्या मदतीने अलवार बासरी वाजवत आसमंतात स्वरांची बरसात करत आहे. त्यामुळे जणू काही आम्हा रसिकांच्या समोर स्वररुपी अमृताच्या ओंजळी रित्या होत आहेत.

या गाण्याची आणखी एक गंमत अशी आहे की “पर्वतांची दिसे दूर रांग” हे कडवे यात रेकॉर्डिंगच्या वेळी जोडले गेले.त्यापूर्वी फक्त दोनच कडवी गायली जायची. पण नंतर घातलेले मधले कडवे त्या ठिकाणी इतके चपखल बसले आहे की ते जोडीव काम आहे हे कधी लक्षातसुद्धा येत नाही. हेच ते प्रतिभावंत कवीचे कवित्व असे म्हणावे लागेल. म्हणूनच अवघ्या दहा ते बारा ओळीत ‘सुधीर मोघे’ यांनी एखाद्या कुशल चित्रकाराने आपल्या कुंचल्याने संध्याकाळ कागदावर साकारावी तशी आपल्या शब्दरूपी कुंचल्याच्या अदाकारीतून काळ्या रंगांच्या विविध छटातून ही गोकुळात उतरणारी सावळी संध्याकाळ साकारली आहे. आमच्या मनावर त्या दृश्याचे स्थिरचित्र त्यांनी लीलया साकारले आहे. कविता म्हणून ही रचना जशी अप्रतिम आहे तसेच त्या शब्दांना श्रीधर फडके यांनी दिलेली सूरांची संजीवनी त्यातील कृष्णवर्ण अधिक गहिरा करते. आशा भोसले यांचा अद्वितीय असा स्वर या गाण्याला एक वेगळीच उंची प्राप्त करुन देतो. म्हणूनच या संपूर्ण अविष्कारात  सांजावलेले आपल्यासारख्या रसिकांचे मन पुन्हा पुन्हा त्या शामरंगी सावळ्या रंगात रंगून जाते.

© डॉ. मेधा फणसळकर

मो 9423019961

≈ सम्पादक श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रीत…एक सुखसाधन..!! ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆ रीत…एक सुखसाधन..!☆ श्री अरविंद लिमये ☆ 

रीत आणि विपरीत यातील फरक नेमका अधोरेखित करतो तो रीतसर हा शब्द!

रीतसर म्हणजे उचित.जे रीतीला धरुन नसेल,म्हणजेच योग्य नसेल ते सगळं अनुचित. म्हणजेच विपरीत.

हे इतकं सगळं सोपं असलं तरी त्यातही एक मेख आहेच. उचित-अनुचित ठरवायचं कसं आणि कुणी? तसं तर रीत कुणीच ठरवत नाही. ती ठरते. रीत त्यातली सोय,योग्यायोग्यता पाहून अनुभवानुसार आवश्यक ते बदल करुन हळूहळू स्विकारली जाते. पुढे काळाच्या कसोटीवर ती खरी उतरली की आपसूकच रुढ होते. मग ती गोष्ट त्यापध्दतीनेच करायचा प्रघात पडतो आणि मग त्या रुढ पध्दतीचीच रुढी बनते.

काळ बदलला की काळानुसार हळूहळूच पण तरीही या रुढीत फरक पडत जातोच. पण ते बदल रुढ होईतोवर रीतीनुसार करायलाच हवं म्हणून त्यामागचा उद्देश लक्षात न घेता अंधानुकरणाने मूळ रीत पाळली जातेच. कारण एखादी गोष्ट रीतसर झाली नाही तर मनालाच रुखरुख लागून रहाते.

रीत म्हणजे प्रघात, शिरस्ता, रिवाज, परिपाठ, कार्यपध्दती आचारपध्दती. अशा या रिवाज, पध्दतीनाच ‘रीतभात’ ही म्हणतात. पूर्वी नव्या नवरीच्या सासरघरी तिच्या प्रत्येक हालचालींवर सर्वांचं बारीक लक्ष असायचं. कांही खटकलं तर ‘माहेरच्यानी हिला कांही वळणच लावलं नाही’ असं म्हंटलं जायचं. हे ‘वळण’ लावणं म्हणजेच करण्यासवरण्याची, वागण्या बोलण्याची शिस्त म्हणजेच रीत समजावून सांगणं. इथे ‘रीतसर’ म्हणजे व्यवहारातील ‘शहाणपण’.

कांही रीती कुलाचाराच्याही असतात. लग्न किंवा शुभकार्यानंतरचं बोडण किंवा गोंधळ हे अशा कुलाचारांचंच एक उदाहरण. कुलाचारांच्या जाती-पोटजातींनुसार विविध रीती असतात व त्या असंख्य तडजोडी करुन कां होईना पण पाळल्याही जातात.

कांही रीती वैयक्तिक पातळीवर वेगवेगळ्या असतात. उदाहरणार्थ स्वैपाक. पदार्थ एकच पण तो बनवण्याची कृती, पध्दत प्रत्येकीची वेगळी. त्या कृती, रीतींनुसार चवी चांगल्या तरीही वैविध्य जपणाऱ्या असतात.

रीत जेवायला बसण्याची, जेवण करण्याची, झोपण्या-उठण्याच्या वेळा पाळण्याची, अंथरुणं घालण्या-काढण्याची अशा अनेक प्रकारच्या कार्यपद्धतीची असते. या रीतीभाती कौटुंबिक पातळीवरच्या. म्हणूनच प्रत्येक घरच्या त्या त्या घरची वैशिष्ठे जपणाऱ्या. वातावरण साळढाळ असणाऱ्या घरी अशा गोष्टीतली शिस्त बरीचशी शिथिल म्हणूनच सोयीची, सुखावह असते. शिस्त कडक, काटेकोर असेल तर ते घर चित्रासारखं सुंदर दिसलं, तरी त्या घरातील आनंदाचा करडा रंग फारसा सुखावह नसतो. घरगुती कार्यपध्दतीतील रीतीभाती घरपण जपणाऱ्या मात्र हव्यातच.

तसंच आॅफिसमधल्या कार्यपध्दतीना, रीतीना काटेकोर नियम असतात. त्यात चालढकल करायची नाही या शिरस्त्यामुळे त्या नियमांचा उद्देशच लक्षात न घेता नियमानुसार काम करण्याचा अट्टाहास ‘लालफितीचा कारभार’ म्हणून बदनाम होतो, तर नियम आणि व्यवहार यांची सांगड घालणारा एखादा अधिकारी शिस्तबध्द काम करुनही लोकप्रिय होतो.

रीती जशा व्यक्ति, कुटुंब, आॅफिसपातळी वरच्या तशाच त्या सामाजिक स्तरावरच्याही असतात. त्या जनरीत, लोकरीत, परंपरा या नावांनी ओळखल्या जातात.

सरकारदरबारी रीतीना शिष्टाचार (protocol) म्हणतात.

निसर्गाच्या रीतीना निसर्गनियम म्हणतात आणि त्यानुसारच सृष्टीक्रम नियत असतो.

अशारितीने सर्वपातळींवरच रीतींचं महत्त्व वादातीत आहे हे खरं, पण निसर्गनियमानुसार काटेकोर वागणं आणि मानवनिर्मित रीतींचं फार अवडंबर न माजवता त्याचा उद्देश लक्षात घेऊन तारतम्य बाळगणं हेच सुखावह ठरणारं असेल..! रीती पाळणं हे ओझं न वाटता आनंददायी ठरणारं असायला हवं. तरचं त्यांचं बंधन न वाटता त्या सुखसाधन म्हणून सहजपणे स्विकारल्या जातील आणि जोपासल्याही..!!

© श्री अरविंद लिमये 

सांगली

९७२३७३८२८८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ झाडोरा ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

 ☆ विविधा ☆ झाडोरा ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆ 

आजची सकाळ नेहमीप्रमाणे खूप प्रसन्न होती. सोनेरी किरणांनी गुलमोहोर( तांबट) आणि शिरिषांच्या(जांभ्या आणि किऱ्या) दोन्ही झाडांना हलकेच कुरवाळले. तशी उंच फांद्यांवरील पोपटकंची पाने हसून उघडली. काल सुर्यास्तानंतर ती निद्राधीन झाली होती. त्यांच्या हसण्याची खसखस खालच्या फांद्यांवरील पानांनी ऐकली आणि तीही झोपाळू डोळे किलकिले करून बघू लागली. अजून रविकिरणे त्यांच्या पर्यंत पोहोचली नव्हती ना! उन्हं वर आली तरी डोक्यावरून चादर ओढून झोपणाऱ्या नाठाळ मुलांप्रमाणे त्यांनी आपले डोळे बंद केले.?? तरीही एक गोडसे स्मित पानापानांवर रेंगाळलेच. पलीकडील गल्लीतल्या आंब्याच्या झाडानेही आपली पाने किंचित हलवून दव शिंपडले आणि जागे होण्याची खटाटोप करु लागले.

जांभ्या आणि किऱ्या समोरासमोरच तर रहात होते. जांभ्याने त्याच्या लगतच्या घराचा टेरेस थोडा झाकूनच टाकला होता. त्या घराची मालकीण थोडी नाराज होती.हं….. जांभ्याच्या सावलीत तिच्या  छोट्या कुंड्यांमधील झाडे पुरेशी वाढत नसत ना!? पण जांभ्या काही ऐकत नसे.तो फांद्या विस्तारुन, हलवून तिच्या गुलांबांबरोबर गप्पा मारे, शेवंतीला गुदगुल्या करे आणि मधुमालतीला निवांत आपल्या

कडेखांद्यावर चढू देई. जांभ्या हळूहळू जागा होऊ लागला आणि फांद्या हलवून थोडी थोडी सूर्यकिरणे या सवंगड्यांना देऊ लागला.

किऱ्याचा पानपिसारा सगळीकडे छान पसरला होता. जांभ्या सारखी त्याच्याजवळ कोणती लतिका फुले वा फळंबाळं नव्हती. तोही तसा प्रेमळच होता. परंतु बिच्चारा! किऱ्या जवळच्या घरातील एक १७-१८ वर्षांची नवयौवना रोज बाल्कनीत येई. गुलमोहोर (तांबट)आणि शिरीष (जांभ्या आणि किऱ्या) यांच्या कडं प्रेमानं बघे.गालातच हसे. आज अचानक किऱ्याची फुलांनी बहरलेली एक फांदी तिच्या बाल्कनीत घुसली होती.किऱ्याला तिचेही गाल आरक्त झाल्यासारखे वाटले. फांदीला प्रेमानं कुरवाळून तिनं एक गिरकी मारली.

किऱ्या रोजच त्याच्यापासून काही फूटांवर असलेल्या तांबटा बरोबर गप्पा मारे. त्याच्या मोरपंखी पिसाऱ्याबरोबर खेळे. हं..  पण आता ग्रीष्म ऋतू सुरू झाला होता. त्याचा मोरपिसारा केंव्हाच गळून पडला होता. केवळ काड्यांचा किरीट. प्रकाशसंश्लेषण नाही. तांबट्याची चूल पेटत नसे ग्रीष्मात. नुसत्या साठवलेल्या अन्नावर तो पोट भरत असे. तसंही पर्णसंभार नसल्याने त्याला ऊर्जाही कमीच लागे.परंतु आत कुठेतरी काहीतरी धडपड चालू असावी बहुधा! ? तांबटाच्या एकाच फांदीला लालचुटुक फूल उमलले. जांभ्या आणि किऱ्या मान तिरकी करून त्याच्याकडं बघत राहिले.किऱ्यानं पानं हलवून दवबिंदूंचं अत्तर वाऱ्याबरोबर फवारलं. एक पिवळी पाकळी लाजत लाजत खाली झुकली आणि तिनं किऱ्याचं अत्तर आवडल्याचं सांगितलं. जांभ्या तांबटापासून थोडा लांब होता. काय बरं करावं? हो!हो!! त्यानं फांद्या हलवून शीतल हवेची झुळूक पाठवली. तांबट मनोमन हरखला आणि बघताबघता नावाप्रमाणेच तामस पिसाऱ्यानं फुलून गेला. काही दिवसातच त्याला पोपटी नाजूक पानंही फुटली. आपल्या छोट्या पर्णतलांच्या टाळ्या वाजवून. तो आनंद व्यक्त करु लागला. बघता बघता हिरव्या चपट्या शेंगांनी तो तरारला. गर्भार स्त्री सारखा जडावला. डोहाळे जेवणाच्या वेळी दिसणाऱ्या मातेसमान सजला. लाल, केशरी, पिवळ्या फुलांचे मोहोर; नाजूक मोरपिसांसारख्या पानांचे नृत्य!! जांभ्या आणि किऱ्या त्याच्याकडं बघतच रहात.

तिन्ही झाडांवर अनेक पक्षी विसाव्याला येत. अगदी पहाटे पहाटे दयाल शीळ घालून सगळ्यांसाठी भूपाळी म्हणे. कावळा, चिमण्या,मैना हळूहळू हजेरी लावत. बुलबूलाच्या जोडीनं बांधलेल्या घरट्यातून त्यांची पिल्लं चोची बाहेर काढून डोकावत. राघूंचा थवा विठू विठू चे भजन करे. थोडासा लांब असलेला, आता मोहरलेला अंबाही कोकीळकूजनात सामील होई. शेजारपाजारच्या खिडक्यांमधून, बाल्कनीतून छोटुले चेहरे डोकावत. त्यांच्या टाळ्या आणि हसरे चेहरे बघून तो झाडोरा कृतकृत्य होई.

पण…

पण….

…. पण हे काय? सूर्यदेव थोडेसे वर आले. माणसांची वर्दळ वाढली. ऑफिसला जाणारे टू व्हीलर वरुन पळू लागले. आणि झाडाखाली गर्दी जमू लागली. प्रथम खूष होत किऱ्यानं फांद्या हलवून गार वाऱ्याची झुळूक सोडली. सावली जास्त दाट केली. वाराही लकेर देत शीतलता पसरवू लागला. पण मग करवत, कुऱ्हाड, फावडी दिसू लागली.. भले मोठे जेसीबी आ वासून पुढं सरसावले. तसा किऱ्याच्या काळजाचा ठोका चुकला. जांभ्याही भेदरलेला दिसत होता. तांबट तर भितीनं कापायलाच लागला. खाली माणसांची वर्दळ वाढली. आवाज चढले. जेसीबी चा स्टार्टर दाबला गेला आणि तांबटाच्या पायाखालची ज मी न हादरली. भूकंप झाल्याप्रमाणे सगळेच थरथरु लागले. जेसीबी नं चांगलंच सात-आठ फूट खणून काढले आणि….. आणि तांबट मुळासकट आडवा झाला..करवती, कुऱ्हाडीनं तांबटाच्या फांद्या तोडण्यात आल्या. खोडाचे मध्ये कापून तीन चार तुकडे केले गेले. तांबटाचे आक्रंदन जांभ्या आणि किऱ्या पर्यंत पोहोचत होते. पण त्यांची भाषा माणसांना कळत नव्हती.

फुललेल्या तांबटाची एक फांदी हातात धरून ती नवयुवती बाल्कनीत ऊभी होती. दोन्ही डोळ्यातून पाणी पाझरत होते.. तिचा मूक साथी पिसारा मिटून, जागीच जमीनदोस्त झाला होता.तांबटाचे रस्ताभर विखुरलेले अवयव गोळा करून टेंपो धूर ओकत निघून गेला…..

…… रस्ता मात्र लाल, पिवळ्या, केशरी गालिच्यानं आणि पोपटी पिसांनी मखमली झाला.

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

मो.नं. ९६६५६६९१४८

Email:  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्वप्नातलं सत्य… ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी

☆ विविधा ☆ स्वप्नातलं सत्य…. ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

आजवर मला कधीच एखादं अद्भुत, चमत्कारिक, उत्कंठावर्धक, अगदी आठवणीत राहावं असं, दुसऱ्याचं मनोरंजन होईल असं किंवा ज्या स्वप्नापासून काही बोध घेता येईल असं स्वप्न पडलं नाही.

माणसाचा स्थायीभाव असलेले हे स्वप्न मला सहसा पडतच नाही. वर्गात मैत्रिणी जेव्हा रंगवून त्यांना पडलेली स्वप्न सांगत आणि त्यात रंगून जात, तेेंव्हा माझ्या चेहऱ्याचा रंग फिका पडे. किती बेमालूम थापा मारतात या? मलाही थापा मारायचा मोह होई.

मी आईला नेहमी विचारी, “आई मला स्वप्न का पडत नाहीत ?” “उत्तर नसलेले प्रश्न विचारायची भारी वाईट सवय आहे या मुलीला, जा.. दिवास्वप्न तरी बघ!” आईचं उत्तर असायचं. पुन्हा माझा नवीन प्रश्न तयार ‘दिवास्वप्न?.’.. ते काय असतं? ते तरी कधीच पाहिलं नाही.

देवा शप्पथ खरं सांगते खोटं सांगणार नाही. कधी नव्हे ते काल मला खरंच स्वप्न पडलं आणि ते सांगावसं वाटलं…….

त्याचं काय झालं…….

अंधार भुडुक झाला होता. डोळ्यात बोट घातलं तरी दिसत नव्हतं. प्रकाशाचा एक कवडसा नव्हे एक बिंदू ही शोधून सापडंत नव्हता. क्षणभर आपण दृष्टिहीन झालो आहोत का? अशी शंका यावी इतका काळोख…. अंगावर शहारा आला. भीतीने गाळण उडाली होती.

मला दरदरून घाम फुटला, तो दार ठोठावण्याच्या आवाजानं…. खरंच कोणी ठोठावत होतं का दार? की भास होता नुसता? बसल्या जागेवरून उठून दार उघडण्याची हिम्मत माझ्यात नव्हती. म्हणून तिथूनच “कोण आहे रे तिकडं?” असं मी विचारलं. अर्थात अपेक्षित उत्तर आलंच नाही.

बऱ्याच वेळा माझं मन मला योग्य ते सल्ले देतं कारण त्याच्याशिवाय मला आहेच तरी कोण म्हणा?….

“अजिबात दार उघडू नकोस. बाहेर करोना उभा आहे.” ते म्हणालं. दरदरून घाम आलेलं माझं शरीर गारठलं.” कोण आहे म्हणून काय विचारतेस? ‘गो करोना’ ‘गो करोना’ असं म्हण…. माझ्या तोंडातून शब्द फुटेनात……

मला आठवले ते फक्त आठवले. रामदास रचित ‘भीमरूपी महारुद्रा’ ‘मारुतीराया बलभीमा’ सगळं सगळं म्हणून झालं पण मारुतीरायाला काही सवड झाली नाही यायला. एव्हाना दार खिळंखिळं झालं होतं. क्षणार्धात ते उघडलं…..

समोर एक प्रसन्न मुद्रेची, सालंकृत, लक्ष्मीस्वरूप दुर्गावतारातील नारी वाघावर स्वार होऊन माझ्यासमोर उभी ठाकली. ‘देवी पावली’ असं म्हणून मी नतमस्तक झाले.

“अगं, माझ्या काय नमस्कार करतेस तू? मी तर ‘करोना मर्दिनी” करोना शब्दानं माझी गाळण उडाली. नाकाभोवती चादर घट्ट गुंडाळून मी मुटकुळं करून खाली मटकन् बसले. वाघ माझ्याकडं डोळे विस्फारून बघत होता. वाघ पार्किंग लाॅट मध्ये उभा असल्यागत उभा होता.

‘करोना मर्दिनी’ या नावातच संहार जाणवला मला. मन म्हणालं, “अगं हिच्यामुळेच सौख्य शांती निर्माण होणार आहे. चटकन नमस्कार कर” मनावर विश्वास ठेवून मी सकारात्मक पवित्रा घेतला आणि पुनःश्च नमन केलं.

ती हसली. “अगं मी तुझी सेविका!” असं म्हणून तिनं आपल्या दहा हातातल्या दहा गोष्टी खाली ठेवल्या. कोणता जादूचा दिवा मी घासला आणि ही देवी अवतरली? असा मी विचार करत होते.

“लसेंद्र बाहुबली, या इकडे.” तिच्या सांगण्यावरून वाघानं रुबाबात पावलं उचलली. त्याचं नावही त्याला साजेसं रुबाबदार असंच होतं. तो तिच्यापाशी आला. तिच्या इशारा शिवाय तो काहीच करत नव्हता याची मला आता मनोमन खात्री पटली पण शेवटी वाघ म्हणा की वाघोबा…. भीती तर वाटतेच ना हो?

मला भेदरलेलं पाहून ती म्हणाली, “अगं तो काही करत नाही.आपलाच आहे तो..” या तिच्या वाक्यानं मला तमाम कुत्र्यांच्या मालकांची आठवण झाली.

“तुझ्या सुरक्षेसाठी ही भारतीय बनावटीची लस घेऊन आले आहे. ती घेण्याचा पहिला मान तुला मिळतोय.” ती म्हणाली. मी रडवेल्या चेहऱ्याने हसले. वाघ ही स्मितहास्य करत होता असे जाणवले मला…

करोनाशी दोन हात करायची ताकद असलेली ही सिरम इन्स्टिट्यूट ची ही लस! याशिवाय आपल्या देशाची लोकसंख्या जास्त असल्यानं मी इतर देशांतून आयात केलेल्या सर्व लशी सोबत आणल्या आहेत, जेणेकरून तुटवडा होऊ नये.” असे म्हणून तिने आयुधांकडं बोट दाखवलं.

ज्या गोष्टीसाठी गेले वर्षभर मी उतावळी होते ती गोष्ट माझ्यासमोर होती. तीही वाघावर बसून आली होती. नशिबवानच म्हणायची मी!

करोना मर्दिनी म्हणाली, “वाघावर बैस म्हणजे मला लस टोचायला सोयीचे जाईल. माझ्या काळजात धसस् झालं. करोना पेक्षाही वाघावर बसून लस घेणे हे भीतीदायक होतं.

श्रीकृष्णानं देखील संभ्रमावस्थेत असलेल्या अर्जुनाला दुर्गा स्तोत्र म्हणायला लावलं होतं. मीही तेच म्हटलं. क्षणभर इतकं मोठं आसन आपल्याला कोणीतरी देऊ करतय याचा आनंदही झाला. माझ्यासमोर लसेंद्र चक्क झुकला… मी त्याच्यावर आसनस्थ झाले.

दुर्गा झाल्याची चमक माझ्या डोळ्यात होती पण भीतीने माझं सर्वांग थरथरत होतं. दातावर दात कडकडा वाजत होते. घशाला कोरड पडली होती. तशातही मी करोना मर्दिनीला विनंती केली,” ताई लस टोचत असतानाचा माझा एक फोटो घ्याल प्लीज?”

“हो! हो! आम्ही तो घेतोच कारण सगळ्यांची तशी मागणी आहे. त्यातून तुझा चेहरा अगदी ‘लसोजेनिक’ आहे. आमच्या लसेंद्र बाहुबलीला आम्ही सेल्फी घेण्यात ट्रेन केलेलं आहे. दे तुझा मोबाईल त्याच्या पंजात”

रेडी ????चीज….. क्लिक!!!

वाघानं  डरकाळी  फोडली. लसीकरणाची नुसतीच पोझिशन घेऊन वाघानं सेल्फी काढला.

पुढच्याच क्षणी इन्जेक्शन टोचलं जाणार होतं…….

“अजिबात घाबरू नकोस. लस घेतल्यावर तुझा चेहरा ‘लसलशीत’ होईल. शिवाय लस घेतल्याचं धाडस केल्याबद्दल तुला मी ‘लसवंती जोशी’ या नावानं सर्टिफिकेट हि देईन….” मी तिच्या ‘लसकोषा’ वर फिदा झाले होते.

सर्टिफिकेट मिळणार या आनंदात मी माझ्या दंडावर शड्डू ठोकला आणि सामोरी गेले……

“आई गंऽऽ” अशी किंकाळी मारत मी उठले तर, दंडाचा चावा एका मुंगीनं घेतला होता……

स्वप्न लगेचच सत्यात उतरलं….

‘लसेंद्र बाहुबली’ वर आरुढ झालेली करोना मर्दिनी ‘लस मोहीम’ फत्ते करण्यात ‘लशस्वी’ झाली हे सुज्ञास सांगणे न लगे!!!

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जीवधन गड आणि नाणेघाट…भाग 1 ☆ श्री विनय माधव गोखले

 ☆ विविधा ☆ जीवधन गड आणि नाणेघाट…भाग 1 ☆ श्री विनय माधव गोखले ☆ 

३० जानेवारी २०२१ रोजी मी रात्री १०:३० वाजता ‘गिरीदर्शन’ च्या ‘जीवधन’ गड ट्रेक साठी ‘व्याडेश्वर’ समोर पोहोचलो. परंतु नेहमीची बस आलेली नव्हती आणि त्याऐवजीची ठरवलेली बस उशिरा येत आहे असे शुभवर्तमान कळले. पुढे जवळजवळ तासभर मागील ट्रेकच्या एकमेकांच्या रंजक गप्पा मारण्यात / ऐकण्यात वेळ कसा गेला ते मात्र कळले नाही. बदली बस मात्र छोटी होती त्यामुळे सर्वजण सामानासह जेमतेमच मावले. नारायणगाव येथे रात्री १:३० ला चहा घ्यायला थांबली तेवढीच नंतर एकदम पायथ्याच्या घाटघर गावातील मुक्कामाच्या घरीच थांबली.

घराबाहेर हवेतून एक “चर्र चर्र” असा आवाज ऐकू येत होता तो कुठून येतोय हे कळेना.  परंतु तेव्हा पहाटेचे ३:३० वाजलेले असल्याने आधी मिळेल तेवढी झोप घ्यावी आणि आवाजाचे कोडे सकाळी सोडवूयात असे ठरवून पथारी पसरल्या. पण थोड्याच वेळात मी जिथे झोपलो होतो त्याशेजारील बंद दरवाजाच्या फटीतून थंड हवा झुळुझुळू यायला सुरुवात होऊन थंडी वाजायला लागली. सकाळी तारवटलेल्या चेहेर्‍याने उठलो पण खिडकी उघडल्याउघडल्या ‘गुलाबी’ सूर्यदर्शन झाले आणि थकवा पार पळून गेला.  गरमागरम पोहे आणि काळा चहा प्यायल्यावर सर्व तेवीस जण ट्रेकसाठी सुसज्ज होऊन निघालो. त्याआधी थोडे जीवधन गडाबद्दल…

सातवाहन काळात म्हणजे इ. स. पू. पहिले शतक ते तिसरे शतक ह्या काळात बांधलेला हा एक अतिप्राचीन गड आहे. ह्यांच्या काळातच ‘नाणे घाट’ हा व्यापारी मार्ग बांधून काढण्यात आला. घाटाच्या माथ्याशी गुहा असून त्यात ब्राह्मी लिपीत मजकूर कोरला आहे. गुंफेत काही प्रतिमाही होत्या ज्यांचे आज फक्त पायच पहायला मिळतात. जीवधन हा ह्या नाणेघाटचा संरक्षक दुर्ग! चला तर पुढे… बघूयात वर्तमान काळात काय काय पाहायला मिळतंय जीवधन गडावर!

आमच्या आजच्या चमूमध्ये एक मनाने तरुण, गड-इतिहास-प्रेमी तसेच मोडी लिपी तज्ञ असे लळींगकर काका खास नवी मुंबईहून ट्रेकसाठी आले होते. मुक्कामच्या ठिकाणाहून गडाच्या पायथ्याजवळ बस आम्हाला घेऊन निघाली तेव्हापासूनच त्यांनी उत्साहाने आजूबाजूला दिसणार्‍या गडांची माहिती द्यायला सुरुवात केली होती.

त्यांनी बोट दाखवलेल्या दिशेला पहिले तर आम्हाला ‘नवरा-नवरी-करवली-भटोबा’ सुळके दिसले आणि त्यामागे काही ‘वराती’ सुळके दिसले. ह्या सगळ्यांना मिळून  ‘वर्‍हाडी  डोंगर’ असे गमतीशीर नाव आहे.

जंगलातील चढाई सुरुवातीला वाटली तितकी सोपी नव्हती. दगड घट्ट नसल्याने व उंच असल्याने त्यावर पाय जपून ठेवावे लागत होते. तरी बर्‍याच ठिकाणी दगडांवर पाय ठेवायला लोखंडी जाळ्या लावलेल्या दिसल्या.

साधारण ८० टक्के चढाई झाल्यावर श्वास चांगलाच फुलला होता. हयामागे कोरोना लोकडाऊन पोटी घ्यावी लागलेली अनेक महिन्यांची ‘सक्तीची विश्रांती’ कारणीभूत होती. पुढील २० टक्के वाटचालीत दगडी पायर्‍या चढून जाणे होते तसेच एका प्रस्तरावरून पुरातत्वखात्याने टाकलेली शिडी चढून जाण्याचा रोमांचक अनुभवही सर्वांना मिळाला.

साधारण अडीच तासात वर चढून आल्यावर उजव्या हातास थोडे खालच्या अंगास लपलेली धान्याची एक दगडी कोठी दिसते. आतमध्ये पायर्‍या उतरून जवळजवळ चार खोल्या असलेले अंधारे कोठार बघायला तुम्हाला टॉर्चच्या प्रकाशाचा आधार घ्यावाच लागतो. आत पायाला सर्वत्र मऊ माती लागते. कोरलेले  दरवाजे आणि कोनाडे असलेले व प्रवेशद्वाराच्या उंबरठावजा पायरीखालून पाण्याची पन्हाळ असलेली ही जागा “पूर्वी एखादे मंदीर असावे का?” अशी एक शंका मनात आल्यावाचून रहात नाही.

क्रमशः ….

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ होलिकोत्सव विशेष – खेळताना रंग बाई होळीचा होळीचा… ☆ सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

☆ विविधा ☆ होलिकोत्सव विशेष – खेळताना रंग बाई होळीचा होळीचा … ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ 

होळी म्हणजे रंगाचा सण.एक रंगोत्सव..भारतात सर्वत्र उत्साहाने साजरा होणारा लोकोत्सव.. होळी सणाची अनेक नावे… होलिकादहन, शिमगा, हुताशनी महोत्सव, फाल्गुनोत्सव तसेच दुसर्‍याच दिवसापासून वसंत ऋतुचे आगमन होते म्हणून वसंतागमनोस्तव किंवा वसंतोत्सव!!

खरं म्हणजे या रंगोत्सवाशी लहानपणापासूनचं केवळ गमतीचं नातं.!! सुकलेला झाडाचा एखादा बुंधा खड्डा खणून रोवायचा. सुकी लाकडं, पेंढा, पालापाचोळा गोळा करुन बांधायचा… आजुबाजुवाल्यांकडून वर्गणी गोळा करायची.. होळी पेटवायची.. ऊसळणार्‍या ज्वाला, तडतडणार्‍या ठिणग्या, कलशातून पाणी ओतत, अग्नीला अर्पण केलेले नारळ अन् नैवेद्य.. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मारलेल्या बोंबा… दुसर्‍या दिवशी धूळवड… ऊधळलेला गुलाल, रंगीत पाण्याच्या पिचकार्‍या,होळीतून काढलेला भाजका नारळअन् होळीच्या धगीवर तापवलेल्या पाण्याने केलेली आंघोळ.. या सामुहिक आनंदाचा मनसोक्त आनंद आम्ही लहान थोरांनी मिळून ऊपभोगला… मनात तेव्हा. नव्हता विचार पर्यावरणाचा.. तेव्हा नव्हते रासायनिक हानीकारक रंग… नव्हतं राजकारण, गुंडागर्दी लुटमार वर्गणीच्या नावाखाली… एकमेकांवर रंग ऊडवण्याचा एक फक्त मैत्रीचा, स्नेहाचा मनमोकळा मजेचा खेळ असायचा.. राधाकृष्णाच्या रासक्रीडेची प्रचलित गाणी निष्ठेनी गायली जायची… पण कुठलाच फिल्मीपणा नव्हता…. होता फक्त आनंद, गंमत सोहळा….. पण आता मनात विचार येतात. का हे सण साजरे करायचे?.

काय महत्व यांचं? कसे साजरे करायला हवेत, कसे नकोत.. वगेरे वगैरे.. पण आपल्या अनेक पारंपारिक सणांमधे, पूजनाबरोबर दहन, ताडन, मर्दन, नादवर्धन असते. दसर्‍याला रावण जाळतो, बलीप्रदेला काठी आपटत ईड जावो पीड जावो.. अ से ऊच्चारण असते.. चिराटं चिरडून नरकासुराचे प्रतिकात्मक मर्दन असते… शंख घंटा ढोल ताशे सारखे नाद असतात.. आणि एक पारंपारिक काहीशी मनोरंजक,फँटसी असलेली ऊद्बोधक कहाणी असते.

फाल्गुन पौर्णीमेला साजरा केल्या जाण्यार्‍या होळी ला होलिका दहन असते.. हिरण्यकश्यपु नावाचा आसुर, त्याची बहीण होलिका जिला अग्नी जाळू शकणार नाही याचे वरदान मिळालेले.. आणि त्याचा विष्णुभक्तपुत्र प्रल्हाद.. विष्णुभक्तीचा अनादर असलेला हिरण्यकश्यपु प्रल्हादाचे भस्म करण्यासाठी, त्याला होलिकेच्या स्वाधीन करतो. पण घडते निराळेच.. अग्नी प्रल्हादाचे रक्षण करतो अन् होलीकेचेच दहन होते.

म्हणून होळी पौर्णिमेला आपण प्रतिकात्मक होलिकादहन करतो.. खरं म्हणजे हा सत्वाचा तामसावरचा विजय आहे!! या निमीत्ताने मनोविकार जाळून टाकायचे. भस्म करायचे.. वाईटाची होळी आणि चांगल्याची पुनर्गुंफण…. बोंबा मारायच्या.. शिव्याही द्यायच्या.. का? हे असभ्य असंस्कृत अमान्य तरीही…?? यामधे मनोविश्लेषणाचे कारण आहे… मनांत खूप कोंडलेलं असतं.. प्रतिष्ठेच्या नावाखाली… समाजाच्या भीतीने.  हे जे काही कुलुपात बंद असते, त्याला या माध्यमाने मुक्त करायचे.. तशी या दिवशी परवानगी  असते… थोडक्यात ही एक थेरेपी आहे… मनातले ओंगळ बाहेर काढण्यासाठी.

शिवाय निसर्ग तर प्रत्येक सणाच्या केंद्रस्थानी असतोच.

शिशीर ऋतुची शुश्कता संपून वसंताचे आगमन होणार आहे… जुनं गळून नवं अंकुरणार… यौवन फुलणार.. सृष्टीच्या प्रणयाचे रसरंग फवारणार.. म्हणून हा रंगोत्सव… वसंतोत्सव… करुया साजरा… कोरोनाच्या कृष्णछायेतील बंधने पाळून या हर्षोत्सवात सामील होवूया… सुकलेली शुष्क चेतना नसलेली काष्ठे वापरु..त्यासाठी वृक्षतोड नको…रासायनिक रंग नाही ऊडवायचे… बोंबा मारु शिव्या देऊ पण केवळ गंमत… कुठलाही हिंसक प्रकार नसेल…. आणि कुणा गलगले मास्तरांनी नाहीच दिली वर्गणी तरीही त्यांना होळीत भाजलेल्या नारळाचा प्रसाद मात्र नक्की देऊ..

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ होलिकोत्सव विशेष – आमचा शिमगा …. ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

 ☆ विविधा ☆ होलिकोत्सव विशेष – आमचा शिमगा ….? ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

(जून्या लेख/ चारोळींची  काही बदलांसह संग्रहित आहुती ?)

होळी म्हणले की ‘ बोंबलणे ‘ आणि ‘ टिमकी ‘ वाजवणे ( या दिवशी स्वत:ची सोडून)  याचे बाळकडू आम्हाला घाटावरच (सांगली) मिळाले. मात्र मुंबईत आल्यावर या दोन्ही गोष्टींना मुकलो. दरवर्षी सोसयटीच्या आवारात अगदी पारंपारिक पध्दतीने होळी साजरी होते मात्र या दोन्ही गोष्टी बघायला ( करायला ) मिळत नाहीत.

मात्र या वर्षी होळी पेटली की ठरवलय ,प्रसादाचा नारळ होळीत सोडायचा आणि मग होळी भोवती प्रदक्षिणा मारत बोंब ठोकायची. ‘ (हा काय करतोय येड्यासासारखा ? ‘? असे सोसायटीतील लोकाना वाटले तरी चालेल .)

वर्ष भरात ज्या गोष्टींमुळे त्रास झाला/ होतो त्यांचा उध्दार करायचाच म्हणून यादी तयार करायला घेतली ती अशी…..

१) पहिली फेरी करोना विषाणूच्या  नावे – ६ वर्षानंतर संधी आलेली बाहेर जायची. साडेसातीचा परिणाम …. ?

२) पर्यावरणवादी – या(ना) लायकांना फक्त होळी आणि दसरा या दिवशीच झाडे, पर्यावरण -हास यांची आठवण होते. ?

३) मुंबईकर – मराठी अस्मितेचा अभिमान बाळगत धुळवडीच्याच दिवशी रंगमंचमी साजरी करणा-या मुंबईकरांसाठी ( आणि यात आता सुसंस्कृत पुणेकर ही आले) तिसरी फेरी.

४) खास ‘ती’ च्या साठी – ती हो आमची , ८.२१ ची  – ठाणे लोकल. एक दिवस जरी वेळेवर आली तर शप्पथ…। ?

५) आम्हाला खोट्या प्रकरणात अडकवून पोलीस चौकीची फेरी घडवून आणणाऱ्यांच्या नावे ?

६) समुहात राजकारणाच्या पोस्ट नको असा ‘शिमगा’ करुन इतरांच्या मजेशीर पोस्टवर स्वत: बोंब मारणाऱ्यांच्या नावे एक फेरी

७) गाण्यातील सूरांसह,  लेखनाची ही वाट लावणाऱ्या सर्व आमच्या सारख्या फ्यूजन कलाकारांच्या नावेही एक फेरी

बास ! बास ! दमलो, याच्या पुढे फे-या मारता येणार नाहीत ( आणि जास्त बोंबलूनही उपयोग नाही ?)

अरे हो सोशल मिडिया सोडायचा असा सल्ला देणाऱ्यांसाठी? विसरलोच की.

नाही नाही हा मात्र सल्ला आपल्याला आवडला. आणि हा सल्ला यांच्यापर्यंतही पोहोचला , लगेच तयारीतच आल्या

नो व्हॅाट्स अप, नो फेसबुक

साजरी करू या होळी….

शब्दांना सोबत घेऊन लगेच

आल्या चार ओळी ?….बोंबला सौख्य भरे❗?

बोंब मारायची ही झाली माझी कारणे

काय तुमची टार्गेट्स तयार  आहेत का ?

कळूदे आम्हाला ही ?

( टीपः वरील यादीत बुडणाऱ्या बँका, ऑफीस , महागाई , भ्रष्टाचार, ट्रॅफिक  जाम यांना मुद्दाम स्थान दिले नाही. यांच्या नावाचा शिमगा रोजचाच आहे. त्यांच्या बद्दल बोंबलणे जाऊ दे त्यांच्या करामतीने आमची बोबडी वळु नये हीच ‘ होळी’ चरणी प्रार्थना  ?)

? अमोल केळकर ?❗

©  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ होलिकोत्सव विशेष – कोकण – रत्नागिरी ची होळी.. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे 

 

☆ विविधा ☆ होलिकोत्सव विशेष – कोकण – रत्नागिरी ची होळी.. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

 होळीचे दिवस, परीक्षांचे दिवस आणि कैऱ्यांचे दिवस या तिन्ही गोष्टी रत्नागिरीच्या आठवणींशी निगडीत आहेत. लहानपणी मार्च महिना आला की अभ्यासाचे पडघम वाजायला घरात सुरुवात व्हायची आणि अभ्यासाबरोबर कैरीचे तुकडे तिखट मीठ घालून खाण्याची आमची सुरुवात असायची! कोकणात होळीचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. त्यामुळे मुंबईचे चाकरमानी या दिवसात सुट्टी घेऊन कोकणात यायचे. मग खरी  होळीच्या उत्सवाची मजा सुरू व्हायची! रोज रात्री अंगणात ‘खेळे’ यायचे!’खेळे’ म्हणजे वेगवेगळे  गाण्याच्या तालावर नाच करणारी ठराविक लोकं असायची. पारंपारिक गाण्याबरोबरच नवीन नवीन सिनेमाच्या गाण्यांवर नाचत केले जायचे. ते काही शास्त्रशुद्ध नाच नसायचे, पण त्यात उत्साह, जोश इतका असायचा की ते बघायला वाड्यातील सर्व लोक उत्सुकतेने, उत्साहाने गोळा व्हायचे.तेव्हा टीव्ही नव्हता, त्यामुळे ही जिवंत, उत्साहाची करमणूक सर्वांना फार आवडायची! या सगळ्या सांस्कृतिक  होळीच्या काळात पुरणाची पोळी लज्जत आणत असे ती वेगळीच!

होळीचा खुंट म्हणजे होळी उभी करायची जागा ठरलेली असते. दरवर्षी एखाद्याच्या बागेतील सुरमाड होळीसाठी निवडला जाई.सुरमाडाला नारळ येत नाहीत. तो सुरमाड तोडून त्या ठिकाणाहून वाजत गाजत होळीच्या ठिकाणी आणला जाई. मुख्य म्हणजे ते झाड माणसे वाहून आणत. त्यासाठी चार पाच तास लागत असत. आमच्या घरापासून जवळच होळीचा खुंट असल्याने आम्ही दुपारपासून ते बघण्यात दंग असायचो! एकदा का होळी उभी राहिली की पाच दिवस तिथे जत्राच असे. तसेच देवीची पालखी ही तिथे आणली जाई.जुगाई देवीच्या मंदिरापासून मिरवणुकीने देवीची पालखी येत असे. तेव्हा खूपच गर्दी उसळत असे.रोज दुपारी आणि रात्री वाजत गाजत देवीची पालखी मंदिरापासून खुंटा पर्यंत येते. कोकणात सगळीकडे होळीचा उत्सव थोड्याबहुत प्रमाणात असाच असतो. काही ठिकाणी होळी लहान असते पण उत्साह तेवढा जास्तच असतो.

देवीच्या पालखी चे पाच दिवस असत पण देवीची पालखी उठली तरी होळी पंधरा दिवस उभी असे. पाडव्याला होळी उतरवतात.होळी उतरवतात म्हणजे उभा केलेला सुरमाड खाली पाडून त्याचे तुकडे करून बाजूला ठेवतात. खुंटावर होळी जाळण्याची पध्दत तेथे नाही. लोकांनी नवसाचे म्हणून बांधलेले अगणित नारळ असतात. होळी खाली आली की ते प्रसादाचे नारळ घेण्यासाठी झुंबड उडते. दरवर्षी लोक श्रद्धेने देवीकडे मागणे मागत असतात. तिचा कौल मिळाला की ते काम होते असे लोकांना मनापासून वाटत असते. मग पुढच्या वर्षी नारळाची तोरणे नवस पुरा करण्यासाठी बांधली जातात.

होळी च्या पाचव्या दिवशी रंगपंचमी येते. मुलांच्या आवडीचा हा सण विविध रंगाचे पाणी उडवून साजरा होतो. पुढे येणाऱ्या उन्हाळ्याला तोंड देण्यासाठी ही सगळी तयारी असते. थंड पन्हं, कैरीची डाळ यांचे स्वाद येऊ लागतात. देशावर धुळवड साजरी केली जाते पण कोकणात मात्र रंगपंचमीची जास्त असते. परीक्षा तोंडावर आलेली असते पण अभ्यासाबरोबरच हे रंगीबेरंगी दिवसही मनाला खूप आनंद देतात. रत्नागिरीची, कोकणातील होळी माझ्या डोळ्यासमोर अशीच येते. इतकी वर्षे झाली, काळ बदलला पण सणवार, प्रथा आहे तशाच आहेत. काळानुसार त्यात थोडे बदल झाले असतीलही, पण ती पालखी, होळीचा खुंट, तो लोकांचा उत्साह हे सगळं तसंच असणार आहे. पुन्हा एकदा मनाने मी रत्नागिरी फिरून आले. तेथील होळीचा सण अनुभवायचा योग पुन्हा कधी येतो पाहू या!

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अनुकंपा…सहृदयतेतून उमटलेला हुंकार…!!☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆ अनुकंपा…सहृदयतेतून उमटलेला हुंकार…!! ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

‘परदु:ख शितल असतं’ असं म्हणतात.सर्वसाधारण अनुभवांती यात तथ्य आहे हे मान्य करावं लागतंच. तरीही या वास्तवाला छेद देणारे अपवादही आहेत आणि म्हणूनच त्या अपवादांच्या सत्कृत्यांच्या पायावरच हवेतीलच नव्हे, तर वैचारिक पातळीवरील प्रदूषणापश्चातही जग अजून अस्तित्त्वात आहे आणि जगणं आनंदी होण्यासाठीचा आशावाद सुध्दा..! हा आशावाद जागता ठेवलाय तो मानवी मनातल्या अनुकंपेने..!!

दुसऱ्याचं दु:ख, वेदना पहाताच स्वतः सुरक्षित अंतरावर न थांबता एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखी तात्काळ मदतीला धावून जाण्याची मनात निर्माण होणारी असोशी ही अनुकंपेची जन्मदात्री..! त्या असोशीतून निर्माण झालेल्या सहवेदनेतूनच पाझरत रहाते तीच अनुकंपा! अशा सहवेदनेच्या स्पर्शानेच परदु:ख परकं न रहाता ते स्वतःचंच होऊन जातं. ते शितल नसतंच. चटके देणारं, कासावीस करणारच असतं. त्या कंपनांमधून परदु:खाला कवटाळण्याची जी ऊर्मी झेपावते तीच अनुकंपा..!

या अनुकंपेला त्या त्या वेळी,त्या त्या परदु:खाच्या तीव्रतेनुरुप पहाणाऱ्याच्या सहृदयतेतूनच अनेक वेगवेगळ्या भावना निर्माण होतात, ज्या करूणा, कळवळा, आस्था, कणव, कळकळ, अशा कोणत्याही रंगरुपाच्या असल्या, तरी सहानुभूती हा या सर्व भावनांमधला समान धागा असतो. कृपा, किंव, दया, या सारख्या तत्कालिक भावनांमधेही उपकाराची भावना ध्वनित झाली, तरी मूलत: असते ती सद्भभावनाच..!

अनुकंपा जगणं आणि जगवणं दोन्हीला पूरक असते. विध्वंसक विकृतीला परस्पर छेद देणारी अनुकंपा हा जगाच्या अस्तित्वाचाच मूलभूत भक्कम पाया असते. लहानपणा पासून कौटुंबिक पातळीवरुन होणारे संस्कार आणि शैक्षणिक पातळीवरील मूल्यशिक्षणातून अशा अनेक मूल्यांचे बिजारोपण होत असे आणि ती बिजं माती ओली असल्यामुळे खोलवर रुजतही असत.पण कालानुरुप वेग वाढवत सुरु असणाऱ्या कुटुंबसंस्थाच नव्हे तर शिक्षण आणि सामाजिक पार्श्वभूमीवरील सर्वदूर पडझडीमुळे खिळखिळी होत चाललेली मूल्यव्यवस्था पुन्हा पूर्ववत करणं ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यासाठी आवश्यक आहे ती थोडी जागरुकता आणि जाणवायलाच हवी अशी निकड!

अनुकंपेसारख्या सहवेदनांच्या हुंकाराला आवर्जून प्रतिसाद द्यायची सजगता ही आता काळाची गरज आहे एवढं खरं!!

© श्री अरविंद लिमये 

सांगली

९७२३७३८२८८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 91 ☆ आठवणी – जाहल्या काही चुका ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 91 ☆

 ☆ आठवणी – जाहल्या काही चुका  ☆ 

काही चूका शेअर केल्याने हलक्या होतात असं मला वाटतं,

मी माझी ऑक्टोबर 2020 मधली चूक सांगणार आहे. ती चूक कबूल करणं म्हणजे confession Box जवळ जाऊन पापांगिकार करण्याइतकी गंभीर बाब आहे असे मला वाटते.

गेले काही वर्षे माझ्या पायाला मुंग्या येत होत्या, डाॅक्टर्स,घरगुती उपाय करून झाले, पण मागच्या वर्षी मी बाहेर चालत जाताना पाय जड झाला आणि मला चालता येईना, ऑर्थोपेडीक,फिजिओ थेरपी सर्व झाले तरी बरं वाटेना, स्पाईन स्पेशालिस्ट ला दाखवलं,एम आर आय काढला, मणक्याची नस दबली गेली ऑपरेशन करावं लागेल असं डाॅक्टर नी सांगितलं, मार्च/एप्रिल मध्ये ऑपरेशन करायचं ठरलं, पण बाबीस मार्च ला लाॅकडाऊन झालं, कामवाली बंद, माझी सून लाॅकडाऊन च्या काळात आमच्या मदतीसाठी आली घरची आघाडी तिनं उत्तम सांभाळली! तीन महिन्यानंतर ती परत तिच्या फ्लॅटवर गेली……

माझ्या पायाच्या तक्रारी होत्याच ऊठत बसत स्वयंपाक करत होते, नव-याने घरकामात खुप मदत केली, माझी सून आणि नवरा यांना खुपच कष्ट पडले.

एक मैत्रीण म्हणाली मणक्याचं ऑपरेशन टळू शकतं मी स्पाईन क्लिनीक ची ट्रिटमेन्ट घेतेय मला बरं वाटतंय, तिथे जायचं धाडस केलं कारण कोरोना च्या काळात मी मला मधुमेह असल्यामुळे कुठेच बाहेर जात नव्हते कुणाकडे जात नव्हतो,कुणाला घरी येऊ देत नव्हतो!पण दोन  महिने माझा नवरा मला स्पाईन क्लिनीक मध्ये फिजिओ साठी घेऊन जात होता.घरी आल्यावर आम्ही अंघोळ करून वाफ घेत होतो, पण माझं दुखणं कमी होईना, शेवटी ऑपरेशन ला पर्याय नाही हे समजलं सेकंड ओपिनिअन घ्यायचं म्हणून डाॅ भणगेंची रूबी हाॅलची वेळ घेतली तिथे दोन अडीच तास वाट पाहिली डॉक्टरांची! मला तिथे निवर्तलेले आप्तेष्ट आठवले खुप अस्वस्थ झालं, नव-याला म्हटलं आपण उगाच इथे आलो…माझी मानसिकता समजणं शक्य नव्हतं त्याला..मग  भांडण झाल्यामुळे डॉक्टरांना न भेटता घरी ! काही काळ अबोला, मी पुन्हा पहिल्या डॉक्टरांना फोन केला त्यांनी चार वाजता बोलवलं व पाच दिवसांनी दीनानाथ मध्ये ऑपरेशन करायचं ठरलं, सर्व टेस्ट झाल्या, दीनानाथ ची भीती वाटत होती, माझी पुतणी म्हणाली काकी वॅक्सिन घेतल्यानंतर ऑपरेशन कर,दीनानाथ मध्ये जाऊ नको,कामवाली पण म्हणाली, “आई रूबी लाच ऑपरेशन करा!” मला ऑपरेशन ची भीती वाटत होती पण त्या काळात कोरोना ची भीती  वाटली नाही, माझं ऑपरेशन म्हणून सून आणि नातू आमच्याकडे सोमवार पेठेत रहायला आले, कोरोना ची तीव्रता कमी झाल्यामुळे कामवालीला  परत बोलवलं होतं, ऑपरेशन करणा-या डॉक्टरांनी “दीनानाथ मध्ये आता अजिबात भीती नाही, नाहीतर मी तुम्हाला सांगितलं नसतं तिथे ऑपरेशन करायला ” अशी ग्वाही दिली! गुरुवारी ऑपरेशन झाले,हॉस्पिटल मध्ये माझ्याजवळ “हे” राहिले. आम्ही सोमवारी घरी आलो, आमची सून कार घेऊन  आम्हाला न्यायला आली हॉस्पिटल मध्ये,  घरी आल्यावर नातू म्हणाला “आजी मला तुला hug करावंसं वाटतंय पण तुझं ऑपरेशन झालंय!”……..

माझे दीर आणि जाऊबाई मला भेटायला आले त्याचदिवशी!

……..आणि चार नोव्हेंबर नंतर आमचं सर्व कुटुंब “पाॅझिटीव” एक दोन दिवसांच्या अंतराने गोळविलकर लॅबचे रिपोर्ट….. मी, हे, दीर, जाऊ केईएम ला एडमिट, सूननातू घरीच होते होम क्वारंटाईन पण सुनेला ताप येऊ लागला, म्हणून ती आणि नातू मंत्री हॉस्पिटल मधे एडमिट झाली, ऐन दिवाळीत आम्ही कोरोनाशी लढा देत होतो…….

या सर्वाचा मला प्रचंड मानसिक त्रास झाला. असं वाटलं  हे सगळं होण्यापेक्षा मी मरून गेले असते तर बरं झालं असतं, ऑपरेशनला तयार झाले ही माझी चूक, रूबी हाॅल मधून परत आले ही पण चूकच ! संपूर्ण कुटुंबाला माझ्या ऑपरेशन च्या निर्णयाने बाधा झाली, मला सतत रडू येत होतं, सारखी देवाची प्रार्थना करत होते…..आपण कुणीतरी शापीत, कलंकित आहोत असं वाटत होतं! आयुष्यभराची सर्व दुःख या घटनेपुढे फिकी वाटायला लागली, सर्वजण बरे होऊन सुखरूप घरी आलो ही देवाची कृपा! मुलगा म्हणाला “आई तू स्वतःला दोष देऊ नकोस, ही Destiny आहे,”

पण हे शल्य सतत काळजात रहाणारच!

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares