मराठी साहित्य – विविधा ☆  काॅफी.. ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ विविधा ☕  काॅफी.. ☕ सुश्री आसावरी केळकर-वाईकर☆

मोहक रंगाच्या कॉफीचा वाफाळता मग, त्या वाफांतून विरत जाणारा फिका धवल रंग आणि कानांवर पडणारं मंद संतूर/सतार किंवा हरिहरनचं ‘मैं खयाल हूं किसी औरका, मुझे चाहता कोई और है’ किंवा गुलाम अलींचं ‘फासलें ऐसे भी होंगे ये कभी सोचा न था, सामने बैठा था मेरे और वो मेरा न था’ किंवा लताचं ‘लग जा गले…’ किंवा आशाचं ‘मेरा कुछ सामान…’  अशी सुरुवात झाली कि मनात खोलवर झिरपत जाणाऱ्या काहीतरी तरल कथानकाची गुंफण असणार ह्याचे संकेत मिळत जायचे आणि नजर मृदुल होत वाचणंसुद्धा आपसूक अलगद होऊन जायचं…. जणू नजरेतलली तीक्ष्णता त्या तरल कथानकाच्या शब्दांवर पडून त्यांना इजा होऊ नये ह्याची मन आपोआप काळजी घ्यायचं. माझी कॉफीशी ओळख आणि जवळीक ही खरंतर अशी नादावणाऱ्या शब्दचित्रातून झाली.

फार मोठे शब्दांचे काहीही डोंगर न रचता एक ‘कॉफीचा वाफाळता मग’ अंत:चक्षूंसमोर जी रस-रंग-गंधयुक्त रोमांचकारी वातावरणनिर्मिती करतो त्याला खरोखरीच तोड नाही… म्हणूनच कॉफीनं मनाचा एक हळवा कोपरा कायमस्वरूपी व्यापलेला आहे. जिव्हाळ्याच्या व्यक्तीचं उत्कंठेनं, हुरहुरतेपणी वाट पाहाणं असो, प्रत्यक्ष ती व्यक्ती समोर बसलेली असताना तिच्यासोबतची मनं जोडणारी नेत्रपल्लवी असो, कधी पाठ फिरवून गेलेल्या व्यक्तीच्या आठवणींत तरसणं असो, कधी असह्य एकटेपणाशी संवाद असो… कुठल्याही कथानकात ‘कॉफीचा मग’ सहजी सामावून जातोच शिवाय त्या प्रसंगाच्या शब्दचित्रातल्या भावनांचे रंग जास्त गहिरे, गडद करत जातो. त्यातून उमलणाऱ्या वाफा डोळ्यांसमोर येतायेता भोवताली भरून राहिलेली हुरहुर आपल्या जाणिवांत उतरते आणि आपण थेट त्या पात्राच्या अंतर्मनात उतरून त्यावेळची त्याची मनोवस्था अनुभवतो…!

लहानपणी घरात चहा-साखरेच्या डब्यांची जोडगोळी अगदी हाताशी येईल अशी कट्ट्याशेजारच्याच भिंतीतल्या कडाप्प्यांच्या रॅकमधे समोरच दिसायची, त्याच्या मागे एक तसाच उभट पण आकाराला किंचित छोट्या डब्यात प्लॅस्टिकच्या पिशवीतच कॉफीपूड ठेवलेली असायची. चमचा चहा-सारखेच्या डब्यातल्यासारखा किलवर आकाराचा असायचा. मात्र हा ठेवणीतला डबा क्वचित कधीतरी बाहेर निघायचा… कुणीतरी चहा न पिणारं आणि कॉफीच घेणारं आलं तर! चहा करणं त्यामानानं ओबडधोबडपणे पटकन उरकता यायचं, मात्र कॉफी करणं हा एक साग्रसंगीत सोहळा वाटायचा.

चहासाठी आधण हे पाण्याचं ठेवायचं आणि कॉफीसाठी मात्र दुधाचं… कॉफीच्या ‘खास, खानदानी, श्रीमंत’पणाची सुरुवात ही अशी पहिल्याच क्षणापासून व्हायची. त्यात मापात साखर घालून उकळी येईतोवर पिणाऱ्याच्या आवडीनुसार एकीकडं सुखद वासाच्या वेलदोड्याच्या दाण्यांची पूड करावी लागायची, कधी चिमटभर जायफळाची पूड त्यात टाकली जायची, नाहीतर ‘अपनी सिर्फ कॉफी’सुद्धा पुरेशी असायची. दुधाला छान उकळी आली कि गॅस मंद करून त्या शुभ्र फेसांत प्रमाणांत कॉफीपूड घातली कि तो दोन रंगांचा संगम फार देखणा वाटायचा. डब्यात चमचा असला तरीही त्या पुडीच्या मुलायमपणाचं स्पर्शसुख अनुभवण्यासाठी ती चिमटीत धरून पाहायचा मोह आवरायचा नाहीच. पांढऱ्या रंगावर उमटत जाणारी कॉफी कलरची नक्षी आणि श्वासांत उतरत जाणारा तो मोहक वास ही अनुभूतीच एकमेवाद्वितीय असायची. हळूहळू तो क्षीरडोह कॉफीच्या रंगात माखला जायचा आणि त्यात चिमूटभर वेलदोडापूड घालून पटकन ताटली झाकली कि नजाकतदारपणे समेवर आल्यासारखा आनंद व्हायचा. कॉफीची बंदिश सजवतानाचा हा आकृतीबंध मोहक वाटायचा.

दक्षिण भारतात चहापेक्षा कॉफी प्रिय असलेली मी पाहातेच आहे. लोक इथे कुटुंबाच्या गरजेनुसार महिन्या-दोन महिन्याला ठराविक किलो कॉफी ही दुकानांतून ताजीताजी दळून आणतात. कॉफीच्या बियांत  ठराविक प्रमाणात चिकोरी मिसळून दळण दळलं जातं. ‘फिल्टर कापी’ करण्यासाठी एक स्टीलचं दोन भाग असणारं उभट डब्यासारखं भांडं असतं. त्याच्या वरच्या भागाच्या तळाला बारीकबारीक छिद्रं असतात. त्यात सकाळसकाळी कॉफी पूड भरून वर उकळतं पाणी ओतून झाकण घट्ट लावायचं आणि कुकरच्या डब्यासारखा हा भाग खालच्या भागावर बसवायचा. त्या छिद्रांतून बराच वेळ पाणी ठिबकत राहातं आणि हे कॉफीचं डिकोशन तयार झालं कि दिवसभर गरजेनुसार त्यात उकळतं दूध आणि साखर घालून कॉफी प्यायची. रोमॅंटिसिजमचा सिम्बॉल असणारा कॉफीचा मग मात्र इथं आढळत नाही. एक पसरट वाटी आणि त्यात  कॉफी गच्च भरलेलं एक छोटं भांडं अशी कॉफी दिली जाते. मग आपण भांड्यातून वाटीत आणि वाटीतून भांड्यात असं जरा वेळ खेळत बसून साखर विरघळवायची आणि ती कॉफी गट्टम करायची.

आजकाल काही उंची हॉटेल्समधे, एअरपोर्टवर वगैरे कायच्या काय पैसे मोजून मिळणारा अत्यंत पांचट कॉफीचा फेस हा मात्र तिचा घोर अवमान आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. माझ्या मनातल्या कॉफीच्या तरल रुपाचा हा अगदी चोळामोळा असल्याचं माझं ठामच मत आहे. तसली कॉफी पिणाऱ्या लोकांना मला एकदा विचारायचं आहे कि, ‘केवळ स्टेटस सिंबॉल म्हणून ही कॉफी आपण सेवन करताहात कि पदार्थाचं रूप-रंग-गंध-चव काहीच न जाणवण्याइतकी आध्यात्मिक उन्नती झाल्यानं आपणांस कोणती चव आवडली नाही असं होतंच नाही!?’… बघू कधी योग येतो! वाफाळत्या कॉफीबरोबरच ‘कोल्ड कॉफी’ पिणारेही लोक जगात आहेत हाही मला आश्चर्याचा धक्काच होता.

माझ्या काळजातलं कॉफीचं रुपडं मात्र जामच ‘रोमॅंटिक’ आहे आणि कायम राहील ह्यात शंका नाही.

 

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आठवणीच्या जुन्या पुलावर (ललित लेख) भाग – 1☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ विविधा ☆ आठवणीच्या जुन्या पुलावर  (ललित लेख) भाग – 1  ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆ 

(१९६०-६४चा काळ, हा माझ्या कॉलेज जीवनाचा काळ. ते वय रोमँटिक कल्पनेत रमण्याचं. तसंच त्या काळातील सामूहिक मनवरही रोमँटिसिझमचाच पगडा होता. म्हणूनच की काय, कुसुमाग्रज, बोरकर, शांता शेळके यांच्या कवितांची, विशेषत: प्रेमकवितांची मनावर विलक्षण मोहिनी होती. प्रत्यक्ष प्रेमाचा अनुभव घेणारे फार थोडे. प्रेमाच्या कल्पनेवर प्रेम करणारे माझ्यासारखे खूपच खूप…. नव कवितेने त्या काळात कुतूहल निर्माण केले असले, तरी तरी युवा मनात ती काही तितकिशी रुजली, स्थिरावली नव्हती. युवा मन सफल-विफल प्रेमाची गीते गाण्यात, विरहाचे दु:ख सोसण्यात आणि उसासे सोडण्यात दंग. या अशा रोमँटिक जीवनाबद्दल कुतुहक, प्रेम, आकर्षण वाटण्याच्या काळात आणि वयात, मंगेश पाडगावकरांचे धारानृत्य, जिप्सी, छोरी, उत्सव असे काव्यसंग्रह हाती लागले. त्यातील प्रेमकवितेबद्दल इतकं प्रेम, आकर्षण, आस्था, जिव्हाळा वाटू लागला, की त्यातल्या किती तरी कविता, अवतरणे पुन्हा पु्न्हा वाचू लागलो. एकमेकींना वाचून दाखवू लागलो. त्या भावनांशी तादात्म्य पावता पावता, एक ललित लेख मनात साकारत गेला आणि मनातच राहिला. नुकतीच 10 मार्चला पाडगावकरांची जयंती झाली. त्या निमित्ताने त्यांच्या कविता पुन्हा नव्याने वाचता वाचता, कधी तरी लिहिलेला आणि मनाच्या तळात राहून गेलेला हा लेख उसळून वर आला आणि पुन्हा गद्धेपंचविशीत घेऊन गेला.)

? ? ? ?

किती दिवस… महिने… वर्षे उलटली. जुन्या आठवणींच्या पुलावरून येरझारा चालू आहेत. पण तिकडच्या टोकाला आहेस ना तू? उदास व्याकुळ डोळे काय बघताहेत? आठवते तुला ती अखेरची भेट? क्षणभर हातात घेतलेले हात… त्या स्पर्शाची संवेदना अजूनही अंगभर थरथरते आहे. त्या पुलावरून जात जात किती मागे पोचलोय मी. अगदी बालवयात पोचलोय.

आठवते आहे ती बालपणीची शाळा. शाळा कसली? चार खिडक्या असलेले चौकोनी खोकेच. भल्या पहाटे (आठ वाजता) शाळा सुरू व्हायची. प्रार्थना, मग कर्कश्य आवाजातला मास्तरांचा हुकूम. ‘काढा पाट्या..कुठाय उजळणी…चला दाखवा.’ माझी पाटी कोरी. मग खवचट चष्म्यातून रोखून बघणारी भिंगे…. नि माझ्या हातावर सपासप पडणारे वेत. मी किती वेळ मुसमुसून रडत राहिलो, मलाच कळले नाही. मग मऊ हाताच्या स्पर्शाने जाग आली. भुरे, सोनेरी केस असलेल्या, निळ्या डोळ्याच्या मुलीच्या हाताचा तो स्पर्श होता. मी तिला नाव विचारले. ती म्हणाली, `नाव? छोरी… हात पुढे कर’ आणि हातावर पडली नाजुक दातांनी तोडलेली कैरीची फोड. तिचीआंबट-गोडी अजूनही जिभेवर ताजी आहे. अजूनही स्वप्नात तिचे सोनेरी कुंतल भुरभुरतात आणि

अजून घेते टिपुनि वेदना

‘ नजर तिची ती निळी खोडकर…

गिरकी घेते मनी कलाबूत तिच्या स्वरांची

नाव? छोरी… हातपुढे कर.’

बालणीची आणखी एक आठवण. भातुकलीच्या खेळात गंमत वाटायची, तेव्हाचे ते दिवस…. पावसाच्या चिंब वेळी होड्या सोडण्याचा खेळ… तू म्हणालीस, ‘माझी होडी पुढे गेली… तुझी मागे..’ नंतर पुढे जाणार्‍या होडीबरोबर तूही पुढे निघून गेलीस. मी किनार्‍यावर. नि:स्तब्ध… निश्चल… असहाय्यसा.

बघता बघता तू बालिकेची किशोरी आणि किशोरीची नवतरुणी झालीस. जसे फूल फुलावे तशी उमलत राहिलीस. गंध उधळत राहिलीस. कधी तू दिसायचीस लाल फुलांनी झुलणारी डाली, कधी वाटायचे तू असशील वादळवारा. आपल्या श्वासांनी उधळशील सार्‍या वृत्ती सैरावैरा. कधी भासायचे,

‘पार्थिव आणि अपार्थिव यांच्यामधले झिळमिळणारे क्षितीज सुगंधाचे तू’

तुझी किती रुपे, वास्तवातली आणि माझ्या कल्पेतलीही…. या दोन्ही रुपांची किती सरमिसळ झालीय माझ्या मनात.  माझ्या मनमंजुषेत ती सारीच रुपे, वास्तवातली आणि कल्पनीतलीही मी अगदी जपून ठेवलीत. तुझ्याबद्दल वेगळे काही नव्यानेच जाणवले आणि तुझी ओळख नव्यानेच झाली.

‘तेव्हाची ती पहिली ओळख अपुली

बोलायाचे खूपच होते

तुला… मलाही…

परंतु मौनाने मौनच धरले हृदयाशी

अन शब्दांची झाली पळसफुले

पिवळ्या जर्द उन्हाने भरलेली.

नंतर एकदा मला भेटायला तू वाट चुकवून आलीस आणि निराळीच होऊन गेलीस. तू मुळी तुझी उरलीच नाहीस. तू मला वेढलंस आणि थरथरत्या खोल जळी मला ओढलंस. त्यानंतरच्या किती भेटी… अंधार्‍या रात्री. चांदण्या रात्री. समुद्राकाठी. पुळणीवती. तळ्याकाठी…. किती तरी भेटी. कधी नि:शब्दशा. कधी अखंड वटवटणार्‍या या भेटी.

—-क्रमश: भाग 1

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘जाणिवा’.. मनाच्या मार्गदर्शिका! ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆ ‘जाणिवा’.. मनाच्या मार्गदर्शिका! ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

विविध अनुभवांनी मनाला केलेल्या स्पर्शातूनच निर्माण होत असतात जाणिवा. विचार म्हणजे जाणिवा नव्हेत.विचारांची ये जा सुरुच असते अखंड, अव्याहत मनात. विचार कधीकधी आले तसे निघून जाणारे नसतातही. कांही रेंगाळतही रहातात. कांही ठाण मांडून बसणारे असतात. कांही रुतणारे, सलणारेही असतात काट्यांसारखे. अशा विचारांना अलगद काढून दूर भिरकावत असतात त्या जाणिवाच. त्या विचारांना शिस्त लावतात. योग्य दिशा देतात आणि अयोग्य विचारांना अटकावही करतात. मनाला योग्य विचारांचा मार्ग दाखविणाऱ्या मार्गदर्शिकाच असतात त्या मनाच्या..!

जाणिवा म्हणजे भावना नव्हेत. भावनांना लगडलेली भावफुले असतात जाणिवा आणि त्या फुलांमधले मधुघट परागकणही..!

जाणिवा अनेकरंगी असतात. त्या ‘जबाबदारीच्या’ असतात.’कर्तव्याच्या’असतात. कृतज्ञतेने भारलेल्या जशा, तशाच जगणं कृतार्थ करणाऱ्या असतात जाणिवाच!

नेणिवेतल्या गूढ अंधारकणांना प्रकाशाचा स्पर्श करतात जाणिवा. योग्य अयोग्याचा सद् असत् विवेक जागवतात जाणिवाच.

त्या तीव्र असतात तेव्हाच आपण जबाबदारीने वागतो, कर्तव्याचे महत्त्वही जाणतो. समाजाकडून या ना रुपात कांहीतरी घेत असणाऱ्या आपल्याला समाजाला आपण लागत असलेल्या देण्याची आठवण करुन देत असतात त्या या जाणिवाच.जाणिवा अलगद जागत्या ठेवणाऱ्यांचं आयुष्य कृतार्थ तर होतंच आणि तेच आनंददायीही होत रहातात इतरांसाठीही. ज्यांच्या जाणिवा अशा प्रगल्भ नसतात ते मात्र जगत रहातात स्वत:पुरतंच फक्त स्वतःसाठी. प्रकाशाचा स्पर्शच न झालेलं त्यांचं एकेरी जगणं ओझंच बनून रहातं त्यांच्या स्वतःच्याच शिरावरचं. जाणिवा अलगद जाणिवपूर्वक जपायला हव्यात ते यासाठीच. कारण क्षणभर थांबून स्वतःचा मार्ग योग्य दिशेचा आहे ना हे पहायला प्रवृत्त करीत असतात त्या निगुतीने जपलेल्या या मनाच्या मार्गदर्शिकाच..!!

 

© श्री अरविंद लिमये 

सांगली

९७२३७३८२८८

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तेजशलाका – सत्यभामा टिळक भाग-3 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

☆ विविधा ☆ तेजशलाका – सत्यभामा टिळक भाग-3 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆ 

या सूर्यालाही खग्रास ग्रहण लागले.स्वतःच्या बचावाचे जे भाषण टिळकांनी कोर्टापुढे केले, ते जवळजवळ साडेचार दिवस चालले.पण गेंड्याचे कातडे पांघरलेल्या त्या ज्युरी आणि न्यायाधिशांवर त्याचा शून्य  परिणाम झाला. त्यांना राजद्रोही ठरवले. त्यांना सहा वर्षाचे काळे पाणी आणि एक हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. सारा महाराष्ट्र या शिक्षेचे वृत्त ऐकून हादरून गेला. मी तर पूर्ण कोसळून गेले. मधुमेहाने शरीर आतून पोखरले होते, या बातमीने ते कोलमडून गेले. अंथरूणावर उठून बसण्याचे  त्राण माझ्या मध्ये राहिले नाही.

तुरुंगवासातल्या एकांताचा टिळकांनी फार चांगला सदुपयोग केला. त्यांनी गीतेवर टीका लिहिली आणि गीतारहस्य हा हा साडेआठशे पानांचा ग्रंथ लिहिला. पाली, हिब्रू, फ्रेंच, जर्मन या भाषाही ते तिथे शिकले. वयाच्या 52 व्या वर्षी ते विद्यार्थी होते.

तिकडून येणाऱ्या पत्रांवरून आम्हाला त्यांचे वर्तमान कळे. मुलेही त्यांच्या इच्छेप्रमाणे आज्ञेप्रमाणे वागत. कोणीतरी मला पत्रातील मजकूर वाचून दाखवे. त्यांच्या अचाट आणि अफाट बुद्धिमत्तेचे मला आश्चर्य वाटे. त्यांनाही मधुमेह होता. पण त्यावर ही ते कशी मात करत होते, ते आणि परमेश्वर जाणे. मी मात्र त्यांच्या कुठल्याच राष्ट्रकार्यात मदत करू शकत नसे म्हणून मला फार वाईट वाटे. पण साधी अक्षर ओळखही नसलेली मी, चार भिंती बाहेरचे जग न पाहिलेली मी, बाहेरच्या जगाचा थोडाही अनुभव नसलेली मी काय करणार होते? मुलांकडे पाहत कशीतरी दिवस अन रात्र ढकलत होते. रात्र-रात्र डोळ्याला डोळा लागत नसे. शरीराचा डोलारा कोलमडतोय हे मला जाणवायला लागले होते. या जन्मी पुन्हा त्यांचे दर्शन होणार नाही, ते भेटणार नाहीत, याची खात्री पटली होती. गळ्यातले मंगळसूत्र सोडून सगळे दागिने मी काढून ठेवले. रोज काळे साडी नेसायला सुरुवात केली. आजूबाजूचे काही समजेनासे झाले. कोणी काही बोललं तरी तिकडे लक्ष देण्याचा  मी टाळायला लागले. फक्त “भक्त विजय” हा ग्रंथ कोणी वाचून दाखवला तर मात्र मनःपूर्वक भक्तिभावाने ऐकत होते. त्यांच्या कार्याला यश मिळो, अशी परमेश्वराला आळवणी करत होते. मुलांच्यावर निदान त्यांचे कृपाछत्र राहो म्हणून प्रार्थना करत होते. भारतातल्या जनतेला भविष्यात तरी शांतता,  सुख समृद्धी आणि स्वातंत्र्य लाभो अशी आळवणी करत होते. देशाला स्वातंत्र्याचा सूर्य लवकर पहायला मिळवून म्हणून त्या मातृ देवतेला अश्रूंचा अभिषेक करत होते. अशातऱ्हेने का होईना, स्वातंत्र्याच्या यज्ञकुंड यामध्ये माझ्या देहाची समिधा अर्पण करायला मी आतुर झाले होते.

अखेर तो दिवस उगवला. त्यांची भेट झाली नाही, तरी सौभाग्यलेणं  लेवून,अहेवपणी समाधानाने,दोन्ही मुलांना आशीर्वाद देत मी या जगाचा निरोप घेतला.

टिळकांना या बातमीचा जबर धक्का बसणार याची खात्री होती. पण आहे आघात धीराने, शांतपणे ते पचवतील हेही माहीत होते. कारण डगमगून जायला ते सर्वसामान्य होते काय ? ते तर प्रखर तेजस्वी सूर्य पुत्र होते आणि मी त्यांची तेजशलाका!

समाप्त 

© सौ.अंजली दिलिप गोखले

मो  8482939011

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तेजशलाका – सत्यभामा टिळक भाग-2 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

☆ विविधा ☆ तेजशलाका – सत्यभामा टिळक भाग-2 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆ 

समाज कार्य, शिक्षण प्रसार असे करताना त्यांनी, कुटुंबाकडे दुर्लक्ष केले असे मात्र नाही बर ! मोठ्या मुलींची लग्ने, चांगली घरे पाहून करून दिली.. त्यांच्याहून धाकटी तीन मुले शिकत होती. थोरला कॉलेजचे शिक्षण घेत होता. – – – – पण —

त्यावर्षी महाराष्ट्रावर दोन मोठ्या आपत्ती कोसळल्या. दुष्काळ आणि प्लेग. माणसे पटापटा मरत होती. दुर्दैव म्हणजे आमच्या थोरल्या लाही ही प्ले ग ची लागण झाली आणि आम्हा वर दुःखाचा डोंगर कोसळला.पण टिळक त्याही परिस्थितीत लोकांना मदत करत होते. सगळीकडे हाहाकार उडाला,पण सरकार मात्र थंड होते. घरे स्वच्छ करण्याच्या नावाखाली गोऱ्या सैनिकांनी प्रजेचे अतोनात हाल केले. छळ केला. त्याबद्दल टिळकांनी “केसरी” वृत्तपत्रात खूप कडक शब्दात लेख लिहिले. त्याचे परिणाम भलतेच होत होते. जनमानसात प्रचंड असंतोष होता अन तशातच गोर्‍या रॅन्ड साहे बां चा खून झाला. धर पकड दंड धमक्या अशाप्रकारे सामान्य जनतेचा जास्तच छळ सुरू झाला.तेव्हा टिळकांनी केसरीत अग्रलेख लिहिला, “सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे.” त्यामुळे त्या खु ना मागे टिळकांचा हात आहे, असा इंग्रज सरकारचा कयास होता, पक्की खात्री होती. त्यामुळे वॉरंट काढून त्यांना अटक केली गेली. खटला मुंबईला चालला. सरकारने त्यासाठी विशेष न्यायाधीश नेमला आणि त्यांना अठरा महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

या शिक्षेने मी मात्र पुरती कोसळले, मोडून गेले. यांचा काही अपराध नसताना, केवळ संशय, शंका म्हणून एका बुद्धिवान तपस्व्या ला एवढी घोर शिक्षा? मुलाच्या जाण्याचे दुःख आणि हे मोठे संकट, त्यामुळे सभोवताली घरामध्ये काय चाललंय हेच मला कळत नव्हते. जे थोडे कानावर पडत होते ते क्लेशकारक होते. एल एल बी, केसरी कार, प्राध्यापक टिळकांना तुरुंगामध्ये काथ्याकु टावा लागत होता. गुन्हेगारां बरोबर वावरावे लागत होते. जाड भाकरी आणि कांदा घातलेले कालवण खायला मिळत होते. त्यांना कांदा आवडत नसल्यामुळे कोरड्या भाकऱ्या खाव्या लागत. ऐकून माझ्याही घशाखाली घास उतरत नसे.

मात्र पुष्कळ प्रयत्न करूनही इंग्रज सरकारला त्या खुनाशी टिळकांचा संबंध जोडता आला नाही. त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे मोठ्या प्रमाणावर चर्चा होऊ लागली आणि अखेर काही अटींवर, सरकारने कोणालाही कळू न देता, गुपचुप त्यांना घरी आणून सोडले. या तुरुंगवासात त्यांची तब्येत खूपच खालावली. त्यांचे 137 पाउंड वजन 113 पाउंड झाले होते. डोळे खोल गेले होते. चेहऱ्यावर तेलकट पणा आला होता त्यांच्याकडे पाहूनच पोटामध्ये ढवळून येत होते.

सुटून आल्यावर  राष्ट्र कार्यामध्ये त्यांनी पुन्हा झोकून दिले. त्यांचे वाचन, लिखाण, अधिवेशन, भाषण, प्रवास हे अव्याहतपणे सुरूच होते. त्यांची लोक मान्यता वाढत होती. “टिळक बोले आणि जनता  चाले” असे काही चालले होते.

देशातील वातावरणअधिक गरम गरम होत चालले होते. त्यातच बंगालमध्ये बॉम्बचा स्फोट झाला. “तरुणांनी हा मार्ग पत्करला हे देशाचे दुर्दैवच आहे. पण या  मुलांना या मार्गावर जायला कोणी भाग पाडले? सरकारने!या गोष्टीसाठी सरकारच जबाबदार आहे.” असे  आणि देशाचे दुर्दैव आणि हे उपाय टिकाऊ नाहीत हे दोन जळजळीत लेख केसरीमध्ये लिहिल्यावर इंग्रज सरकारने त्यांच्यावर राजद्रोहा चा खटला चालू केला. कोर्टामध्ये आपले काम टिळक स्वतः चालवत असत. तेजस्वी सूर्याला दुसर्‍या कोणाचा आधार घेण्याची जरुरी काय?

© सौ.अंजली दिलिप गोखले

मो  8482939011

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दाखला – भाग – 1 ☆ सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

☆ जीवनरंग ☆ दाखला – भाग – 1 ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ 

…….सकाळपासून तानीबाईची लगबग चालू होती…

“लवकर लवकर आवराया हवं.”

नळाला पाणी आलं, तसं पटकन् अंग तोंड धुतलं.

रात्रीची खरकटी भांडी घासली. लुगडं धुतलं. झाडपूस केली. रात्रीचं कोरडं बेसन ऊरलं होतं. एक भाकर थापली अन् खाऊन घेतलं. एकटा जीव. शरीर थकलंय्. पण जगणं आहेच ना?

कालच तांबड्या येऊन गेला. म्हणत होता, “म्हातारे काळजी नको करू. रेशनकार्ड हायना तुझ्याकडे?

मग ग्रामपंचायतीत जा… तिथे दाखव. तू निराधार आहेस.

म्हातारी आहेस.. तुला महिन्याच्या महिन्याला पैकं मिळेल.

नवं सरकार चांगलं आहे. गरीबांचं वाली हाय. निराधार, म्हातार्‍यांसाठी कसलीसी योजना हाय म्हणे… तुला महिन्याला सहाशे रुपये मिळतील… रग्गड हाय की.. तुला रोजचा घास मिळेल. औषधपाण्यालाही दिडक्या राहतील….. ग्रामपंचायत फार लांब नव्हती.. तरी पायीपायी जायाचं.. म्हणून ऊन्हं चढायच्या आत निघाया हवं… रात्रीच तिनं झोपण्यापूर्वी रेशनकार्ड शोधून ठेवलं होतं

तिला ना लिहीता येत होतं ना वाचता….

खूप वर्षापूर्वी कधीतरी असंच, कुणा पक्ष्याच्या कार्यकर्त्याने काढून दिलं होतं. त्यांत काय लिहीलं होतं, तेही तानीबाईला माहीत नव्हतं… त्या कार्यकर्त्याने तिला विचारले होते,

“म्हातारे, कोणकोण राहातं घरात?”

तानीबाईने सांगितले  होते,  “मी अन् मोतीराम…..”

निघताना लुगड्याच्या केळ्यात तिनं एक छोटंसं कापडी पाकीट ठेवलं. त्यात काही सुटी नाणी होती.

चहापाण्यापुरती…… एका कापडी पिशवीत तिनं रेशनकार्ड गुंडाळलं आणि ते हातात घट्ट धरुन ती निघाली…

रस्त्यांत एक दोन जण भेटले.

“कुठं निघालीस गं म्हातारे…?” म्हणून चौकशीही केली. ऊत्तर न देता ती चालतच राह्यली.

ग्रामपंचायतीत ती पोहचली तेव्हां तिला तिथे गर्दी दिसली. बरीच रांग होती. एकदोन डोकी ओळखीचीही होती. पण तानी बाईला कुणाशीच बोलायचं नव्हतं….

एक छोटं टेबल होतं… भींतीवर गांधीजींचा फोटो होता.

आणखीही कुणाकुणाचे फोटो होते. काहीबाही लिहीलेलंही होतं… टेबलापाशी दोन माणसंही बसली होती. आणि ते समोरच्या चोपडीत काही लिहुन घेत होते.

रांगेतला एकेक माणूस पुढे सरकत होता… प्रत्येकाचं वेगळं काम… वेगळी कागदपत्रं…

तानीबाई गपगुमान रांगेत उभी राहिली. तिचा नंबर आल्यावर टेबलाजवळच्या माणसानं विचारलं,

“बोला आजी…..”

क्रमश:….

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तेजशलाका – सत्यभामा टिळक भाग-1 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

 ☆ विविधा ☆ तेजशलाका – सत्यभामा टिळक भाग-1☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆ 

नमस्कार.

ओळखलं का मला? इंग्रजांना ज्यांनी ठणकावून सांगितलं,” स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच”

त्या सूर्यपुत्राची मी पत्नी. सत्यभामा .

आमच्या काळामध्ये पतीला आम्ही इकडची स्वारी असेच म्हणत होतो. इ.स. १८७१च्या वैशाख महिन्यात लग्न होऊन मी टिळकांच्या घरी आले. त्यावेळी ३कडची स्वारी होती पंधरा वर्षाचीआणि मी तर त्याहूनही लहान. गंगाधर पंतांच्या पत्नी, म्हणजे बाळ टिळकांची आई म्हणजेच माझ्या सासुबाई जाऊन पाच वर्षे झाली होती. त्यामुळे दापोली तालुक्यातून मी टिळकांच्या घरी लग्न करून आले आणि सत्यभामा झाले.

माझ्या माहेरची एक आठवणीतली गोष्ट सांगते.आमचं घर पैशाने खूप श्रीमंत नसलं तरी मनाची खूप श्रीमंती होती. एके दिवशी सकाळी दारावर एक भिक्षेकरी आला. कणगी तुन ओंजळभर तांदूळ घेऊन मी ते भिक्षेकऱ्याला घातले. त्याने तांदूळ घालताना खणकन आवाज ऐकला. म्हणून त्यांनी हात घालून पाहिले तो सोन्याची बांगडी. त्याने ती बाहेर काढली आणि म्हणाला, “अहो, ही सोन्याची बांगडी चुकून भिक्षेत पडली पहा. हे घ्या. नीट ठेवा.” ही गडबड एकू न माझे वडील आले आणि म्हणाले, “जे एकदा दिले ते परत घेण्याची आमची, आमच्या घराण्याची रीत नाही. तू ती घेऊन जा आणि सुखाने तिचा काय वाटेल तो उपयोग कर.”

तिकडे टिळकांकडे ही राहणी साधी होती. मी साधं लुगडं आणि साध्या कापडाचे झंपर वापरी. मी काही शिकले-सवरले नव्हते बरं !मला साधी अक्षरओळखही नव्हती.पण इकडची स्वारी खूप हुशार आहे,मोठी मोठी पुस्तके वाचते, एवढे मला माहिती होते. कॉलेज का काय म्हणतात, तिथे जाऊन ते वकील झाले, एवढे माझ्या कानावर आले होते.

आमच्या घरी भरपूर काम असे. उसंत म्हणून मिळायची नाही. तुम्हाला सांगते, मरेपर्यंत क्वचितच घराचा उंबरठा मी ओलांडला असेल. आमच्या घरातलं जेवण ही साध होतं. सकाळ संध्याकाळ होणारा चहा हीच तेवढी श्रीमंती होती.

इकडच्या स्वारीचे स्वतःचं सामान म्हणजे ड्रॉवर असलेलं डेस्क, दोन खुर्च्या आणि पुस्तकाचं कपाट. नाही म्हणायला त्यांची आराम खुर्ची त्यांना खूप प्रिय होती. आलेल्या लोकांशी बोलणं या आराम खुर्चीतच होई. वर्तमान पत्रांचा मजकूर ते स्वतः लिहीत नसत, तर ते या आराम खुर्चीतच लेख नीकाला सांगत. सांगताना मधून मधून सुपारी कातरून खात. फक्त महत्त्वाची पत्र ते स्वतः लिहीत.

आडकी त्यानं सुपारी कातरण्यात ही त्यांचं कौशल्य होत बर का!.. आत्ताच्या पिढीला अडकीता म्हणजे काय हाच प्रश्न पडायचा !

एकदा सुपारी हातात घेतली, की इतक्या सुबकपणे कातरत, ती पूर्ण कातरून झाल्यावर ही अख्ख्या सुपारी प्रमाणे त्यांच्या हातात असे.

आम्हाला दोघांनाही मधुमेहाची व्याधी जडली होती. त्यांना करावा लागणारा प्रवास, दगदग, मानसिक त्रास, तुरुंगवास यामुळे माझे मन सतत चिंतेने ग्रासलेले असे. तुरुंगामध्ये त्यांना करावे लागणारे कष्ट, निकृष्ट दर्जाचे अन्न याबद्दल कोणी माझ्यासमोर बोलत नसत पण मला न सांगता हि ते समजत असे.

टिळक अत्यंत बुद्धिमान, तेजस्वी विचारांचे आणि शब्दाला जागणारे होते. इतके की मित्राला दिलेल्या शब्दाला जागण्यासाठी कारण नसताना त्यांना तुरुंगवास भोगावा लागला त्यांनी अपार कष्ट झेलले. किती पैसा, वेळ, दगदग, धावपळ, मानहानी आणि अपमान झाले त्याला काही गणतीच नव्हती.

आमची मुले ही टिळकां प्रमाणेच बुद्धिमान आणि प्रखर विचारांची होती. मुले आपल्या वडिलांबरोबर धिटपणे बोलत. एकदा मुलीने इतर मुलींप्रमाणे झगझगीत कापडाच्या परकराचा हट्ट धरला.मात्र टिळकांनी ठामपणे नकार दिला.एकदा मुलांना त्यांनी संध्या केली का म्हणून विचारले.त्यांचाच मुलगा! त्याने विचारले, “तुम्ही कुठे करता रोज संध्या?”तेव्हा टिळक त्याला म्हणाले,”  मी वेद पठण करतो. त्यामुळे संधेची जरूरी नाही.”.

© सौ.अंजली दिलिप गोखले

मो  8482939011

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अहल्या – भाग-2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ विविधा ☆ अहल्या – भाग-2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆ 

(मागील भागातइंद्रासारख्या देवराजाच्या विरुद्ध जाण्याची हिंमत कोण दाखवणार? त्यापेक्षा अहल्येला दोषी ठरवणं, अपराधी ठरवणं जास्त सोपं होतं. जास्त सोयीचं होतं. त्यामुळे त्यांनी तिच्याशी बोलणं टाकलं असेल. नातं तोडलं असेल. तिच्याबरोबर कुठलाही व्यवहार करणं टाळलं असेल. ती अगदी एकटी, एकाकी पडली असेल, रस्त्यावरच्या शीळेसारखी. ….. इथून पुढे -)

श्रीरामाने अहल्येचा उद्धार केला, याचा अर्थ एका बाजूने अहल्येच्या मनातली अपराधीपणाची भावना दूर केली असेल. संवेदनाशून्य आणि बधीर मनोवस्थेतून बाहेर यायला तिला मदत केली असेल. स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव करून घ्यायला मदत केली असेल. तिच्यात संवेदना, चेतना निर्माण केल्या असतील. त्याचवेळी सामाजिकदृष्ट्या, अहल्या निरपराध आहे, हे ठामपणे सांगून, तिच्या कुटुंबियांनी आणि समाजाने तिचा स्वीकार करावा, असे आवाहन केले असेल.

‘नरेंद्र कोहली’ या हिन्दी लेखकाने रामायणावर आधारलेल्या आपल्या ‘दीक्षा’ या कादंबरीत ‘अहल्योद्धारा’चा हाच सामाजिक आशय उलगडून दाखवलेला आहे. राम हा युवराज. सम्राट दशरथाचा पुत्र. भावी सम्राट. तेव्हा त्याची मान्यता, ही सर्वसामान्य प्रजेच्या दृष्टीने महत्वाची ठरली. अनुकरणीय ठरली. अहल्येला रामाने समाजमान्यता मिळवून दिली. तिचं निर्दोषत्व ग्राह्य धरलं. तिला एक प्रकारे न्याय मिळवून दिला. या अर्थाने रामाने अहल्येचा उद्धार केला.

केव्हा तरी ‘विनय राजाराम’ या हिन्दी कवयित्रीची ‘तुम अहल्या नहीं हो’ ही कविता वाचली आणि ‘अहल्या’ या शब्दाचा एक वेगळाच अर्थ मनाशी उलगडला. इथे ‘अहल्या’ ही सामाजिक नीति-नियमांच्या, कल्पना- धारणांच्या प्रस्ताराखाली दबल्या गेलेल्या स्त्रीची प्रतिनिधी म्हणून यते. या स्त्रीला ना स्वत:चं मन, ना इच्छा-आकांक्षा, ना कल्पना-भावना, ना संवेदना-चेतना. म्हणून कवयित्री म्हणते, ‘समाजाच्या प्रतारणेच्या, फसवणुकीच्या प्रस्तराखाली दबलेल्या हे नारी, तू प्रस्तर ( दगड) नाहीस. तू परमाणू आहेस. (या विश्वाचे सृजन परमाणूपासून झाले, असे मानणारे एक तत्वज्ञान आहे.) त्यादृष्टीने तू विश्वाची जननी आहेस. निर्माती आहेस. ऊठ. जाग. स्वत:ला ओळख. आपल्या स्वत:च्या उद्धारासाठी, उन्नतीसाठी तू स्वत:च राम बन.

आपल्या स्वत:च्या विकल परिस्थितीला आपण स्वत:च अनेकदा कारणीभूत असतो, नाही का सख्यांनो? आपल्यातील ऊर्जेची, कार्यशक्तीची आपल्यालाच ओळख नसते. म्हणूनच आपली सखी कवयत्री ‘विनय राजाराम’ आपल्याला सांगते, ‘तू निश्चय कर, तू निश्चल नाही, चल बनशील.

‘अहल्या नहीं, हल्या बनोगी

मन-मस्तिष्क और कर्मशक्तीसे

अनुर्वरा नहीं, उर्वरा बनोगी’

हल म्हणजे नांगर. ‘हल्या’ म्हणजे नांगरण्यायोग्य, अर्थात सुपीक जमीन. ‘अहल्या’ म्हणजे बरड जमीन. ज्या जमिनीत नांगरणी-पेराणी करता येणार नाही अशी जमीन. ज्या जमिनीवर संस्कार करताच येणार नाहीत, ज्याच्यावा पडलेलं बीज, तसंच निष्फळ राहील, अशी अहल्या तू नाहीस. मन-बुद्धी, कर्म- शक्तीच्या योगाने तू ‘अनुर्वरा’ नाही, ‘उर्वरा’ बनशील. म्हणजे सुफलीत, सृजनशील बनशील. चांगल्या विधायक विचारांचं बी तुझ्या मन-बुद्धीत वाढेल. विकासेल. चांगलं कार्य तुझ्या हातून घडेल. नवसृजन होईल. ‘तू अहल्या नाहीस… अहल्या नाहीस…’

सखयांनो, आपल्या आसपास, जवळच्या- दूरच्या परिवारात एखाद दुसरी शिळेतील अहल्या आढळते. तिला दिलासा देणं, तिचा आत्मसन्मान जागृत करणं, तिला क्रियाशील बनवंणं, एवढं तरी आपल्याला करायलाच हवं नाही का?

समाप्त 

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – उंच तिचा झोका ☆ तेजस्विनी डॉक्टर रखमाबाई राऊत- भाग – 4 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ उंच  तिचा  झोका ☆ तेजस्विनी डॉक्टर रखमाबाई राऊत – भाग – 4 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

समकालीनच नव्हे तर आजच्या स्त्री समोरही माणूस म्हणून स्वतःचे अधिकार खेचून आणण्यासाठी संघर्ष कसा करायचा याचे उत्तम उदाहरण रखमाबाईंनी घालून दिले. आज एकविसाव्या शतकातही स्त्री बद्दलचा दृष्टिकोन फारसा बदललेला नाही. फक्त त्याची तीव्रता कमी झाली आहे. स्त्री भ्रूण हत्या, स्त्रियांवरील अत्याचार, स्त्री-पुरुष असमानता या गोष्टी साऱ्या जगभर आहेतच. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही स्त्रियांना त्यांच्या कामाच्या कौशल्यापेक्षा कमी वेतन दिले जाते. शेतमजुरी करणारया स्त्री  पासून उच्चपदस्थ स्त्रियां पर्यंत हीच परिस्थिती आढळते.  स्त्री-पुरुष समानता कागदावरच आहे. दीडशे वर्षांपूर्वीच्या त्या कठिण काळातील रखमाबाईंचा एकांगी लढा हा निश्चितच प्रेरणादायी, स्फूर्तिदायी आहे. रखमाबाईंनी इतिहास घडविला. समकालीन स्त्रियांमध्ये विद्रोहाची ठिणगी निर्माण झाली. आजही त्यांचा इतिहास स्फूर्तीदायक आहे. त्यांना विनम्र प्रणाम.

समाप्त

©  सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ झुंज ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

☆ विविधा ☆ झुंज ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆ 

ही कथा आहे एका आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या पत्नीची, ज्योती जाधवची. शेजारच्या गावात राहणाऱ्या किसन लवांडेच्या लेकीची. दोन भावांच्या पाठीवर जन्मलेल्या ज्योतीला तिच्या वडिलांनी मुला प्रमाणे वाढविले, दहावीपर्यंत शिक्षण दिले आणि योग्य वेळ येताच शेतकरी कुटुंबातील गणपाशी लग्न लावून दिले. आई वडील, दोन भाऊ असलेल्या एकत्र कुटुंबात ज्योतीने पाऊल ठेवले ठेवले. सुखी संसारात किरकोळ कुरबुरी नंतर शेतीच्या वाटण्या झाल्या. शेतीसाठी सहकारी बँकेकडून कर्ज ‌ काढलं होतं, घराच्या डागडुजीसाठी नात लगा कडून उसने पैसे घेतले होते पण एक वर्षी कोरडा दुष्काळ दुसरे वर्षी अवकाळी पावसाचे थैमान आणि तिसऱ्या वर्षी गारपीट. त्यामुळे लागोपाठ तीन वर्षे हाती पिक आले नाही. डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढतच गेला. अशा भयंकर संकटाचा सामना करता करता प्रथम सासऱ्याने आत्महत्या केली आणि दोन महिन्यांनी नवऱ्याने गळफास लावून घेऊन जीवन संपविले. पतीच्या आत्महत्येनंतर ज्योतीच्या पायाखालची जमीन सरकली. उधारी उसनवारीची दारे बंद झाली. काय करावं कसे करावं काहीच सुचेना. ना शेती तंत्राची ची माहिती ना व्यवहाराची कल्पना. तिने बैलगाडी सावकाराकडे गहाण टाकली. त्यावेळी मातेसमान असणारी सासू आणि घरात काम करणारा राम काका तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. राम काका म्हणाले “पोरी धीर धर हिंमतीने उभी उभी राहा आणि शेती सांभाळ”. पित्याप्रमाणे असलेल्या राम काकांच्या आज्ञेचे पालन करून ज्योती उभी राहिली. नव्याने जगायचं माणूस ठरवतो तेव्हा पहिलं पाऊल अवघड असतं पण निग्रहानं पाऊल ठेवलं की सर्व जमते. घरातल्या पुरुषांना जे जमले नाही ते करून दाखवायचं अशा निर्धाराने तिनं शेतात पाऊल ठेवलं. सोसायटी कडून मिळालेल्या कर्जाऊ पैशातून सोयाबीनचे बी बियाणे विकत आणले. राम काकांच्या मदतीने शेतात सोयाबीन पेरले. त्यावर्षी पावसाची कृपा झाल्यामुळे पिक चांगले आले. सोयाबीनची मळणी झाल्यावर सोयाबीनची पोती भाड्याच्या बैलगाडीतून गावात घेऊन गेली लोकांनी खूप नाव ठेवली, त्या वेळी प्रचंड मनस्ताप झाला अगदी आत्महत्येचा विचारही मनात तरळून गेला पण आपल्या मुलासाठी आणि सासु साठी ज्योतीने तो विचार दूर सारला. नवऱ्याच्या आत्महत्येनंतर त्याचे शेत मिळेल म्हणून भाऊबंदांनी तिला खूप त्रास दिला. घराची कौल फोडली शेतातली काम करायला येणाऱ्या मजुरांना शेतात पाय ठेवण्यास मज्जाव केला पण ज्योतीने ठरवले की शेतातल्या कोणत्याच कामासाठी इतरावर अवलंबून राहायचं नाही व स्वतः सर्व काम करायची. शेतातले तण काढणे, पिकाला पाणी देणे, पिकावर औषध फवारणी करणे ही काम ज्योतीने राम काकांच्या मार्गदर्शनाखाली केली. मुलाला सांभाळायची जबाबदारी सासुने स्वीकारली होती बांधावर लावलेला भाजीपाला बाजारात जाऊन विकण्यातही कमीपणा मानला नाही. सोयाबीनच्या विक्रीतून आलेल्या पैशातून तिनं बैलगाडी सोडवून आणली.दुसऱ्या वर्षी आलेले पीक स्वतःच्या बैलगाडीतून सोसायटीमध्ये विकून आली. शेती विषयक तंत्रज्ञान तिनं आत्मसात केलं अद्ययावत बी बियाणे खते यासंबंधी माहिती मिळवली व आपलं शेत पिकवलं. पण हिम्मत तिला एका रात्रीत आली नाही त्यासाठी तिला झुंजावे लागलं. आपल्या मुलासाठी व वृद्ध सासु साठी तिची दोन-तीन वर्षे झगडण्यात गेली. आज शेती विषयक सल्ला घेण्यासाठी इतर शेतकरी ज्योतीकडे येतात आणि ती सर्वांना सहाय्य करते. अशी शेतकऱ्याची एक असाह्य विधवा आज गावासाठी आधार बनली आहे. स्वतःचं उदाहरण देऊन इतर स्त्रियांना हिम्मत देत आहे आणि विनवत आहे “रडणं सोडा आणि हिमतीने उभ्या रहा…”

 

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares