मराठी साहित्य – विविधा ☆ गरज ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी

☆ विविधा ☆ गरज ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆ 

जगण्यासाठी ‘ प्राणवायूची’ गरज! जीवनासाठी ‘जीवनाची’ (पाण्याची) गरज! तसेच उदर भरणासाठी ‘अन्नाचीही’ गरज! लज्जारक्षणासाठी ‘कापडाची’ गरज!

विश्रांतीला ‘रात्रीची’ गरज! नव्या दिवसाच्या सुरुवातीला ‘रवीराजाची’ गरज! एवढ्या मोठ्या ‘संसाराला’ ‘पृथ्वीची’ गरज!

पृथ्वीवरील मानव जात ह्या अस्तित्वासाठी ‘कळात-नकळत सर्व वायू, खनिजे,धातू’ आदींची गरज!

मानवी गरजांसाठी ‘झाडे,पशु,पक्षी ‘ व ‘निसर्गाची’ आदींची हि गरज!

मानव, पशू , पक्षी, जलचर,उभयचर याना वंशवृद्धी साठी ‘प्रजननाची’ गरज!

जन्म दिलेल्या वंशाला कर्तव्य रुपी ‘सांभाळण्याची,घडवण्याची ‘ गरज!

अर्भकाला ‘पान्हयाची’ गरज! ‘वात्सल्याची’ गरज! प्रेमाच्या ‘कुशीची’ व ‘उबेची’ गरज!

कालपरत्वे, ‘शिक्षणाची’ गरज!

हे शिक्षण फक्त पुस्तकीच नव्हे, तर ‘संस्कार, धर्म, नीतिमत्ता, माणुसकी, सामाजिक बांधिलकी, थोर मोठ्यांचा आदर, सर्वांशी नम्रता, प्रेमभाव, सहनशीलता, त्याग वृत्ती, जबाबदारीची जाण, मर्यादा आदीं शिकण्याची गरज! काही वेळेस हे शिक्षण आपोआप मिळत असते–अनुकर्णातून, अनुभवातून। पण एक माणूस म्हणून ह्या सर्व गोष्टी मिळवाण्याची गरज!

नियम व शिस्तीची गरज! मग ती स्वतापूर्ती नसून प्रत्येकाशी संबधीत जोडली जाते!

ह्या सर्व जीवनाचे ‘ रहाट गाडगे! चालवण्यासाठी मुख्यत्वे ‘चलनाची’ गरज!

‘चलन’ मिळवण्यासाठी, ज्ञान, हुशारी, चतुराई, दिवसरात्र धावपळ व कष्टाची गरज!

आपल्याकडचे ज्ञान दुसर्यांना देण्याचीही गरज! शिकण्याबरोबर शिकवण्याचीही गरज!

कचेरीत व इतर कामाच्या ठिकाणी नीटनेटकेपणा, कर्तव्यदक्षता, व्यवहार व शिष्टयाचाराची गरज!

स्वतःच्या आवडी, छंद जोपासणे व त्यातून आनंद मिळवण्याचीही गरज!

मग काहीजण संगीत म्हणतील, ऐकतील, काहीजण काव्य करतील, काही वाद्य वाजवतील, काही चित्रकार होतील,काही जण स्वैर गार झुळूक घेऊनही सुखवतील।  — जीवनाचे अवघड समीकरण सोडवताना , काही turning पॉईंट येतील. त्यावेळी कुठेतरी शांत प्रसन्न संगीत, छंदजोपासणे, समाज कल्याण आवड असणे, व करणे, ह्यातून नव्याने आपण पुन्हा घडत असतो, त्यामुळे हे छंद जोपासणे हि सुद्धा ‘गरजच’!

दैनंदिन जीवनाच्या रेलचालीत, अगदी लहान गोष्टी, वस्तू, माणसे सर्वांची आपल्याला पर्यायाने गरज लागते, भासते।

एकमेकांवर अवलंबून असलेल्या गोष्टी तर ‘गरजे’ शिवाय पूर्ण होऊच शकत नाहीत!

आणि आज प्रत्येक व्यक्ती,नाती,कचेरीत कर्मचारी, कितीही बुद्धिजीवी असुदेत एकमेकांवर, अस्तित्वावर अवलंबून असतो.

सगळं ‘मीच’ करू म्हटलं तर काहीच धड होत नाही. आणि ‘मला कोणाची गरजच नाही’ हे विधान ‘अहं’  पणाने परिपूर्ण असते. हा अहं सोडनेही ‘हितावह’ व गरजेचे असते.

आयुष्यात चालताना पडणे, धडणे, जखम होणे,चटके बसने, हेलकावे खाणे असे विविध  परवानगी आपण विविध कसोट्यातून उतरत असतो, तीही एक ‘गरजच’ त्यातून धडे घेणेही गरजेचे असते ।त्यातून खूप काही शिकत असतो आपण.

मनुष्य योनीत जन्माला येऊन जीवयातील मखमल, हिरवळ टिकवण्यासाठी काही तडजोडी कराव्यात, काही झटकून टाकावे, काही वगळावे, काही स्वीकारावे, मनाला व दुसर्यांना आनंद मिळवा म्हणून कुठलाही राग न ठेवता ‘माफ’ करावे, हि सुद्धा ‘गरज’ क्लेश तुन क्लेश व इतर वृत्ती वाढतात, त्याला वेळीच समजून आळा घालण्याची ‘गरज’.

दुसर्यांचे हित करताना, चिंताताना, आनंद द्यावा व आनंद मिळवावा. हि सुद्धा ‘गरजच’ मारून मुटकून काहीच मिळत नसते, ‘प्रेमानेच प्रेम मिळते’ , ‘प्रेमानेच प्रेम टिकते’ हे प्रेम टिवण्याचीही ‘गरजच’.

© सौ अश्विनी कुलकर्णी

सांगली  (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दानयज्ञ ☆ सौ. वीणा रारावीकर

☆ विविधा ☆ दानयज्ञ ☆ सौ. वीणा रारावीकर ☆ 

अधिक “अश्विन” सुरू झाला आहे. अधिक महिन्यात दानधर्म करावा असे सांगितले जाते. इतकेच नव्हे, तर अधिक महिन्यातील कोणत्या तिथीला काय दान करावे, याचे नियमही असल्याचे सांगितले जाते. या कालावधीत दान केलेल्या एका रुपायाचे पुण्यफळ दसपटीने मिळते, असेही सांगितले जाते.

संस्कृतमधील एक श्लोक सर्वांनाच परिचित आहे.

शतेषु जायते शूरः सहस्त्रेषु च पण्डितः ।

वक्ता दशसहस्त्रेषु दाता भवति वा न वा ॥

शूर माणूस शंभरात एक, पण्डित हजार मध्ये एक, वक्ता दहा हजार मध्ये एक परंतु दाता मिळणे मुश्किल असते.

भारतीय संस्कृती, परंपरा, संस्कार यांमध्ये दानाला अधिक महत्त्व आहे. अगदी रामायण, महाभारत काळापासून दानाचे महत्त्व अधोरेखित झालेले आहे. आजही आपण “दानशूर असावे ते  कर्णासारखे” असेच म्हणत असतो.

दान हे सत्पात्री सुध्दा असले पाहिजे. सत्पात्री दान म्हणजे जे दान आपण देत आहोत ते योग्य व्यक्तीला दिले गेले पाहिजे. जी गोष्ट देत आहोत ती गोष्ट घेण्याची त्याची पात्रता पाहिजे. ज्या वस्तूची ज्या माणसाला गरज आहे, त्याचवेळी ती दिली गेली पाहिजे.

म्हणून दान म्हणजे धन किंवा संपत्ती या स्वरुपातच दिले गेले पाहिजे असे काही नाही. श्रीमंतांकडे देण्यासाठी धनदौलत असेल, तर एखाद्या कलाकाराकडे त्याची कला तर गरीब शिक्षकाकडे त्याचे ज्ञान. रुग्णसेवेला समर्पित डाॅक्टर आणि देशसेवेला अर्पण झालेला सैनिक आपल्या जीवाची आहुती या “दान” यज्ञात करतच असतात. सध्याच्या कोव्हीडच्या महामारीत अनेक लोक आपापल्या परिने दान करत आहेत. एकमेकांना मदत करत आहेत.

आपल्यासारखे सामान्य लोक रक्तदान करतात. मरणोत्तर नेत्रदान करतात. यापेक्षा पुढे जाऊन काही लोक अवयवदान किंवा देहदान करतात. देहदान आपल्याकडे सर्वात प्रथम कोणी केले असेल तर दधीची ऋषींनी. गीतेतील श्लोकाप्रमाणे आत्मा अमर, अविनाशी  असतो.

“नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।

न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।। ”

आत्म्याचे कोणत्याही शस्त्राने टुकडे करता येत नाहीत. अग्निने तो जळत नाही किंवा पाणी त्याला ओला करू शकत नाही. वायू त्याला शोषून घेऊ शकत नाही. माणसाचा मृत्यू झाला की आत्मा एक शरिर सोडून दुसऱ्या शरिरात प्रवेश करतो. मग हे मृत शरिर सुध्दा कोणाच्यातरी उपयोगी पडलं तर किती चांगली गोष्ट आहे.

आपले लाडके कवीवर्य विं.दा. करंदीकर यांनी दानाचे महत्व सांगणारी कविता लिहिली.

“देणार्‍याने देत जावे

घेणाऱ्याने घेत जावे

घेता घेता एक दिवस

देणार्‍याचे हात घ्यावे”

त्यांनी स्वतःसुध्दा देहदान करून समाजापुढे एक आदर्श घालून दिला आहे. नवीन चांगले डाॅक्टर आपल्याला हवे असतील तर त्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक अशी ही गोष्ट आहे. तसेच अवयवदान, त्वचादान यांनी आपण एखाद्याचे प्राण वाचवू शकतो.

आपल्याकडे धार्मिक कार्यातदेखील दान करतात. स्वतःच्या लग्नाच्या पत्रिकेत “अवयवदान, नेत्रदान फाॅर्म भरा, हाच तुमचा आहेर” असे एक-दोन लोकांनी छापले होते. आणि त्याप्रमाणे लग्नसमांरभात संध्याकाळी येणाऱ्या मंडळींना फाॅर्म भरण्यासाठी सोय केली केली होती.

अशा दानयज्ञात आपण आपले नेत्रदान, देहदान, अवयवदान याचे फाॅर्म भरून आहुती टाकली, तर याचे पुण्यफळ हजार पटींनी जास्त मिळेल, असे मला वाटते.

 

© सौ. वीणा आशुतोष रारावीकर

लोअर परेल, मुंबई

(ता.क. – माझ्या आई-वडील दोघांचेही २०१२ साली देहदान केले आहे.)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अब्राहम लिंकन ना पत्र ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

☆ विविधा ☆ अब्राहम लिंकन ना पत्र ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

‘लिंकन साहेब, बऱ्याच वर्षापूर्वी तुम्ही माझ्या सारख्या एका सामान्य शिक्षकाला अतिशय मनापासून जबाबदारी चे पत्र लिहिले होते. तुमच्या गोंडस गोड मुलाला घडविण्याचे काम सोपविताना त्या शिक्षकाला मानाचे स्थान दिले होतेत.

लिंकन साहेब एका कायम स्वरूपी विनाअनुदानीत शिक्षकाचे तळमळीने लिहिलेले हे पत्र वाचाल ना?

तुमचे ते पत्र, तरुणपणी वाचूनच मी मोठ्या ध्येयाने प्रेरीत होवून , जिद्दीने, कष्टाने, एक नाही, दोन नाही, तीन पदव्या मिळविल्या. त्या मिळवताना झालेल्या माझ्या कष्टाची मला फिकिर नाही . पण लिंकन साहेब, त्यासाठी माझ्या आईच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या कधी काढल्या गेल्या, मला समजले नाही . त्या पदव्या मिळवत असताना, माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावरील काळजीचे जाळे मी कधीच विसरू शकत नाही. त्यांना निर्मळ आनंद मी कधी आणि कसा देऊ शकेन याचाच विचार माझ्या मनामध्ये कायम पिंगा घालत असतो.

मात्र लिंकन साहेब, माझ्या या त्रासाचा परिणाम मी माझ्या विद्यार्थ्यावर कधीच होवू देणार नाही . जो थोडा वेळ मला, त्यांना ज्ञानदान करायला मिळतो, तो मी सार्थकी लावतो . त्यांना मनापासून शिकवतो . मला ज्या काही चांगल्या गोष्टी माहिती आहेत, त्या त्यांना समजावून देण्याचा मी आटोकाट प्रयत्न करतो. त्यांच्या समवेत मला थोडाच वेळ मिळतो, कारण कायम स्वरूपी विना अनुदानीत शाळेत तासिका तत्वावर मीकाम करतो . खरच सांगतो, लिंकन साहेब , माझ्या कामावर मी मनापासून प्रेम करतो.

त्या प्रेमाचा मोबदला, माझ्या आईवडिलांना समाधान देण्यात मला उपयोगी पडत नाही, हीगोष्ट माझ्या मनाला खूप सलते , यातना देते . मात्र यावरती मी विचार करून मार्ग शोधलाय . शाळेमध्ये शिकवून झाल्यावर, माझ्या एका विद्यार्थ्याच्या शेतामध्ये मजूरी करून मिळकत वाढवायचे मी ठरवले आहे. परिश्रम, कष्ट, आणि मेहनत याच्या जोरावर मी आई वडिलांना समाधान देणार आहे . त्यांच्या चेहऱ्यावरील हसू मला पहायचे आहे.

मी एक हाडाचा शिक्षक आहे आणि माझ्या विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभर मी कार्यरत रहाणार आहे.

न हरणारा कायम

स्वरूपी

विनाअनुदानीत

शाळेतला एक

शिक्षक.

© सौ.अंजली दिलिप गोखले

मिरज

फोन नंबर ८४८२९३९०११

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ झोका ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

 ☆ विविधा  ☆ झोका ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

गणेश वाडी सारख खेडगाव. बरीच भावंड मिळून झोका खेळत होती वेंण्णाला कोणीतरी मोठा झोका दिला. आणि ती खाली पडली त्या झोक्याने तीच आयुष्यच बदलवून टाकलं डावा हात मोडला. कोणताच उपचार  लागू पडेना.  सात आठ वर्षाची वेण्णा कळा सहन करत होती. अखेर मिरजेच्या मिशन हॉस्पिटल मध्ये  नेलं. डॉक्टरांनी हात  कुमारला लागल्याने तो काढण्याचा निर्णय सांगितला. अर्ध्या दंडापर्यंत हात काढला. मुलीची जात, सगळं आयुष्य जायचं कसं? सगळे काळजीत पडलेप.

रोज वेण्णा आणि आई एकमेकीला धीराचे शब्द देत होत्या. हळूहळू उजवा हात आणि पुढचे दात यांनी परकर बांधता यायला लागला. पोलक्याची बटण लावता यायला लागली. निसर्गनियमाप्रमाणे वेण्णा वयात आली. 9 वारी लुगडं दात पोटाजवळ नेऊन गाठ बांधून, चापून-चोपून नेसायला लागली.

मोठे भाऊ पुण्याला घेऊन गेले. सेवासदन शाळेत घातले. सातवीपर्यंत शिकली. सुंदर मोत्यासारख अक्षर होत . काही दिवसांनी परत आईकडे आली. आणि आणि आता ती भाकरी, पोळ्या, विणकाम, भरत काम पायाच्या अंगठ्याच्या मदतीने करू लागली प्रत्येक काम सुबक करण्यात तिचा कटाक्ष असे. भांडी,धुणं अगदी चकाचक असायचं. आता प्रश्न लग्नाचा.

गजानन गोडबोले नावाचा देखणा, आई-वडील नसलेला मुलगा सांगलीला अग्निहोत्री नातूंकडे रहायला होता. पूजा आणि प्रवचन हेच उत्पन्न. त्याचा आर्थिक प्रश्न आणि देण्याचा व्यंगाचा प्रश्न दोन्ही एकत्र येऊन उत्तर मिळाले. लग्न ठरलं. आणि आणि झालंही. एका हाताने सगळे विधी पार पडले. संसार सुरू झाला. शांत गजाननराव  थोडी तापट वेण्णा. पण रसायन छान आलो होत. कमाईही वाढली होती.वेण्णाला तीन मुली नंतर मुलगा झाला. स्वतः च  घर झालं. दुसरे महायुद्ध झालं आणि आर्थिक सुरु झाली. थोडा भाग भाड्याने दिला.धाकटी मुलगी 8 महिन्याची लहान. गजानन रावांना हृदयविकाराच्या झटक्याने देवाज्ञा झाली.वेण्णा हात पाय गाळणारी नव्हती. खंबीर झाली. प्रवचनाला येणारे गुजराती लोक महिना शिधा द्यायला लागले जोडीला घर भाडे होते. मुलींची लग्न, बाळंतपण सगळं सगळं एक हात कष्ट करत होता. मुलगा नोकरीला लागला. आता तिला आयुष्याची संध्याकाळ दिसायला लागली

आता वेण्णा एका खोलीत एकटीच रहायला लागली. सत्तर वर्ष काम केलेला हात आणि पुढचे दात दुखायला लागले. दोन्ही काम करेनासे झाले तर मी परस्वाधीन म्हणून रोज देवाला प्रार्थना करायची. सांगलीची नाळ सुटत नव्हती. थोडे दिवस मुलाकडे हरिहरेश्वरला निघाली.

बस भरलेली होती. गाव जवळ आल आणि काय झालं कळायच्या आत बस उतारावरून खाली पडली. आरडा ओरडा चालू झाला. कुणीतरी वेण्णाला उचलून खाली दगडावर बसवले. डोक्याला मार लागला होता. मोडके तोडके शब्द तोंडून बाहेर पडले. ‘सर्वजण सुखी रहा’. दुसरा हात उभा राहू शकत नव्हता. पण पण अर्ध्या दंडा पर्यंतचा थोटुक,लेण्याला परस्वाधीन न करता सर्वांचा कायमचा निरोप घेत होतं. वर खाली वर खाली होत होता. एखाद्या झोक्या सारखा! झोका

गणेश वाडी सारख खेडगाव. बरीच भावंड मिळून झोका खेळत होती वेंण्णाला कोणीतरी मोठा झोका दिला. आणि ती खाली पडली त्या झोक्याने तीच आयुष्यच बदलवून टाकलं डावा हात मोडला. कोणताच उपचार  लागू पडेना.  सात आठ वर्षाची वेण्णा कळा सहन करत होती. अखेर मिरजेच्या मिशन हॉस्पिटल मध्ये  नेलं. डॉक्टरांनी हात  कुमारला लागल्याने तो काढण्याचा निर्णय सांगितला. अर्ध्या दंडापर्यंत हात काढला. मुलीची जात, सगळं आयुष्य जायचं कसं? सगळे काळजीत पडलेप.

रोज वेण्णा आणि आई एकमेकीला धीराचे शब्द देत होत्या. हळूहळू उजवा हात आणि पुढचे दात यांनी परकर बांधता यायला लागला. पोलक्याची बटण लावता यायला लागली. निसर्गनियमाप्रमाणे वेण्णा वयात आली. 9 वारी लुगडं दात पोटाजवळ नेऊन गाठ बांधून, चापून-चोपून नेसायला लागली.

मोठे भाऊ पुण्याला घेऊन गेले. सेवासदन शाळेत घातले. सातवीपर्यंत शिकली. सुंदर मोत्यासारख अक्षर होत . काही दिवसांनी परत आईकडे आली. आणि आणि आता ती भाकरी, पोळ्या, विणकाम, भरत काम पायाच्या अंगठ्याच्या मदतीने करू लागली प्रत्येक काम सुबक करण्यात तिचा कटाक्ष असे. भांडी,धुणं अगदी चकाचक असायचं. आता प्रश्न लग्नाचा.

गजानन गोडबोले नावाचा देखणा, आई-वडील नसलेला मुलगा सांगलीला अग्निहोत्री नातूंकडे रहायला होता. पूजा आणि प्रवचन हेच उत्पन्न. त्याचा आर्थिक प्रश्न आणि देण्याचा व्यंगाचा प्रश्न दोन्ही एकत्र येऊन उत्तर मिळाले. लग्न ठरलं. आणि आणि झालंही. एका हाताने सगळे विधी पार पडले. संसार सुरू झाला. शांत गजाननराव  थोडी तापट वेण्णा. पण रसायन छान आलो होत. कमाईही वाढली होती.वेण्णाला तीन मुली नंतर मुलगा झाला. स्वतः च  घर झालं. दुसरे महायुद्ध झालं आणि आर्थिक सुरु झाली. थोडा भाग भाड्याने दिला.धाकटी मुलगी 8 महिन्याची लहान. गजानन रावांना हृदयविकाराच्या झटक्याने देवाज्ञा झाली.वेण्णा हात पाय गाळणारी नव्हती. खंबीर झाली. प्रवचनाला येणारे गुजराती लोक महिना शिधा द्यायला लागले जोडीला घर भाडे होते. मुलींची लग्न, बाळंतपण सगळं सगळं एक हात कष्ट करत होता. मुलगा नोकरीला लागला. आता तिला आयुष्याची संध्याकाळ दिसायला लागली

आता वेण्णा एका खोलीत एकटीच रहायला लागली. सत्तर वर्ष काम केलेला हात आणि पुढचे दात दुखायला लागले. दोन्ही काम करेनासे झाले तर मी परस्वाधीन म्हणून रोज देवाला प्रार्थना करायची. सांगलीची नाळ सुटत नव्हती. थोडे दिवस मुलाकडे हरिहरेश्वरला निघाली.

बस भरलेली होती. गाव जवळ आल आणि काय झालं कळायच्या आत बस उतारावरून खाली पडली. आरडा ओरडा चालू झाला. कुणीतरी वेण्णाला उचलून खाली दगडावर बसवले. डोक्याला मार लागला होता. मोडके तोडके शब्द तोंडून बाहेर पडले. ‘सर्वजण सुखी रहा’. दुसरा हात उभा राहू शकत नव्हता. पण पण अर्ध्या दंडा पर्यंतचा थोटुक, लेण्याला परस्वाधीन न करता सर्वांचा कायमचा निरोप घेत होतं. वर खाली वर खाली होत होता. एखाद्या झोक्या सारखा!

© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

पत्ता- ‘पुष्पानंद’ बुधगावकर मळा रस्ता मिरज, जि. सांगली

फो नं. ०२३३-२२१२१५१ मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भरली ओंजळ ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

संक्षिप्त परिचय 

वेगवेगळ्या दिवाळी अंकातून कविता व लेख प्रसिद्ध,

“मनपंख” हा कथा व लेख संग्रह प्रसिद्ध.

☆ विविधा ☆ भरली ओंजळ ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆

ओंजळ ती केवढी; भासते छोटी; मात्र ही असते खूप मोठी. आपली सुखदुःख तिच्यात मावतात.मनाच्या तळाशी दडलेले भावनांचे कल्लोळ ओंजळीतच पेलता येतात. ओंजळीत मायेचं चांदण मावत. आणि ओंजळ भरून आपण जेव्हा धान्य पेरतो. तेव्हा आपल्याला निसर्ग ते राशीच्या रुपाने परत करतो.ओंजळीत आकाश उतरतं व सप्तसागरांच पाणीही मावू शकतं. ओंजळीत म्हणे ब्रम्हांडही मावतं. झोपेतून जाग सकाळी आपण करदर्शन करण्याचा संस्कार आपल्याकडे आहे. बोटांच्या अग्रावर लक्ष्मी, मध्यभागी सरस्वती, आणि मुळाशी गोविंद आहे. करदर्शन करताना आपण त्यांच स्मरण करतो. मगच आपण उद्योगाला लागतो.दारी आलेल्या अथितीला विन्मुख न पाठवता आपण त्याला पसाभर धान्य /पीठ देतो. आरतीनंतर निरांजनाच्या ज्योतीतून परमेश्वराचा आशिर्वाद ओंजळीतूनच घेतो. सुर्याला अर्घ्य अर्पण करतात ते ही ओंजळीतूनच…

साडेतीन हात लांबीच्या माणसाच्या देहाला ओंजळीत मावेल तेवढेच अन्न पुरेसं असत. त्यापेक्षा जास्त खाल्ल तर अजीर्ण होत. तेवढच पाणी माणसाची तहानही भागवतं. उषःपानही ओंजळीनंच करायचं असत. माणसाच्या अनेक क्रुतींशी व भावनांशी ओंजळीच फार घट्ट नात असतं. ओंजळ हे दात्रुत्वाचं रुप आहे. समर्पणाच्या भावनेच द्योतक आहे.  स्रीची लाजही ओंजळीतच मावते. सुवासिनीची ओटी आपण ओंळीनेच भरतो.

ओंजळ स्विकारली तर ती परतही करावी लागते. ओंजळ कधीच रिती होत नाही. ती पुन्हा पुन्हा भरत जाते.ओंजळ सांगते, ‘आधी द्या मगच घ्या’. ओंजळभर रंग द्या, ओंजळभर गंध द्या, झिरझिरत्या सुखाची आभाळभर फुलं घ्या…!

जगणे आता उत्सव व्हावे

आनंदाच्या ओंजळीने भरुन जावे

पैसा अडका याही पेक्षा

ओंजळभर आंनद मिळावा

मन समाधानाने भरुन जावं

दुखरे क्षण सोडून द्यावे

जगणे सारे आनंदी करावे

आनंदाने, समाधानाने  भरल्या ओंजळीने मरण यावे.

 

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ झंपूच्या करामत ☆ श्री विनय माधव गोखले

☆ विविधा ☆ झंपूच्या करामत ☆ श्री विनय माधव गोखले ☆ 

२०१३ साली कोथरुड भागात वानरांच्या टोळीने लोकांचे मोबाईल चोरण्याचा सपाटा लावला होता. इतका हैदोस घातला होता की शेवटी ’सकाळ’ वाल्यांनाही त्यांची दखल घेऊन मोठी बातमी छापणे भाग पाडले होते. ह्या चौर्यकर्मामध्ये अग्रभागी होता आमचा “झंपू” बालक! बरं, मला झंपू बद्दल एवढी माहिती कशी? ह्याचे उत्तर असे की, झंपू आमच्या घराच्या मागील पेरूच्या बागेतच तर रहायला होता! म्हणजे जवळजवळ आमचा ’सख्खा शेजारी’च म्हणा हवं तर!

सकाळ-सकाळी “हूप..हूप!” अशी दीर्घ आरोळी उठली की आम्ही ओळखायचो, वानरसेना जवळच कुठे तरी आली आहे. आम्ही मोठया उत्सुकतेने गॅलरीत आलो की चार-पाच किंवा जास्त वानरांचा कबिला समोरच फांद्यांवर बसून नीलमोहराची कोवळी पाने खात असलेला दृष्टीस पडायचा. कावळ्यांची एकसारखी हैराण काव-काव सुरु झाली की समजायचे कोणीतरी वानर कुठेतरी घरटयाजवळ धोकादायक अंतरावर आले आहे. एखादा हुप्प्या समोरील गच्चीच्या कठडयावरून मोठया ताठयात शेपटी वर करून निघाला की कावळे त्याच्या आजूबाजूने झडप घातल्यासारखे उडायचे. झंपूला मात्र कावळ्यांच्या कलकलाटाचा राग यायचा. शेजारील इमारतीच्या गच्चीवर हा पठ्ठा मस्तपैकी दोन्ही हाताने डिश टी व्ही केबलला धरून लोंबकळलेला असायचा. कावळे जवळ आले की केबलचा हात सोडून, हवेत हात मारून कावळ्यांना मारायला बघायचा आणि पडतापडता पुन्हा केबल पकडायचा. मधूनच कधी कधी आमच्या गॅलरीत कपडे वाळवायच्या चिमट्यांच्या रिंगला एकाच हाताने धरून लोंबकळायचा. वाळत घातलेले कपडे, रुमाल ओढून खाली फेकून द्यायचा. एका खिडकीच्या सज्जावरून दुसर्‍या सज्जावर उडी मारायचा आणि खारींना घाबरवायचा. उंची, खोली, लांबी असे कसलेही धोके त्याला जाणवत नसत. कळपात नव्याने दाखल झालेल्या एका पिल्लाबद्दल तर झंपूला भारी आकर्षण. पिल्लाला त्याच्या आईच्या पोटापासून हाताने अलग करून त्याला सारखे खेळायला ओढायला बघायचा. एकंदरीतच काय, तर सर्व वानरांच्या आणि विशेषत: झंपूच्या लीला बघताना आमची अगदी हसून-हसून पुरेवाट व्हायची.

ह्याच टोळीला आणि खासकरून झंपूला मोबाईलचे आकर्षण कुठून पैदा झाले हे काही आम्हाला कळले नाही. घरामध्ये घुसखोरी करून मोबाईल फोन पळवायला लागले. ज्याचा फोन गेलेला असायचा ती व्यक्ती फोन करकरून कुठे ’आपली’ रिंग ऐकू येते का हा प्रयत्न करायची. इकडे फोनचा रिंग टोन वाजला किंवा थरथरू लागला की वानरबुवा खुश! मग तर तो फोन जाम सोडायचे नाही. झंपूचे डोके लहान असल्याने तो खिडक्यांस लावलेल्या गजांच्या जाळीमधून सहज आत प्रवेश मिळवायचा. एखाद्या फ्लॅटच्या गॅलरीचे दार चुकून उघडे राहिले की सरळच आत यायचा. अर्थात जिने चढून माणसांप्रमाणे राजरोस येणे सुध्दा त्याला निषिध्द नव्हते. फक्त घंटी वाजवून दार उघडायला लावता येते, तेवढेच शिकायचे बाकी ठेवले होते.

एकदा झंपूने माझ्या समोरच्या घरातील टी. व्ही. चा रिमोट कंट्रोलच मोबाईल फोन समजून पळवला. माझ्या खालच्या फ्लॅटमधील मालकिणबाईंनी मोठया हुषारीने उशाखाली लपवून ठेवलेला ब्लॅकबेरी त्याने एखादा सराईत चोर जसा पाळत ठेवून पळवतो अगदी तसाच पळवला. एके दिवशी आरडाओरड ऐकून मी स्वयंपाकघरात गेलो तर झंपूची स्वारी आमच्या फ्रीजवर चढून बसली होती. काठी उगारल्यावर “चीं…चीं” करत त्याने तिथून उडी मारली ती जेवणाच्या टेबलावर, तिथली भांडी पाडून उडी घेतली ओटयावर, तिथून खिडकीत आणि मग गजांतून बाहेर. एका दुपारी सहज खिडकीबाहेर नजर टाकली तर झंपूसाहेब दोन पाइपांच्या बेचक्यात चक्क झोपलेले दिसले, ते सुध्दा छातीशी कुठला तरी मोबाईल फोन कवटाळून!

झंपूच्या बंदोबस्तासाठी प्राणिसंग्रहालयात फोन केला तर म्हणाले “वानरांना कायद्याने काहीही करता येत नाही. चुकून मेले तर आमच्यावर सदोष मनुष्यवधाचा दाखल होईल ना! अहो, वानर कुणालाही इजा करत नाही. फक्त ते आले की फटाके वाजवा, आवाज करा, त्यांना खायला काहीही देऊ नका, त्यांच्या नजरेस नजर देऊ नका, त्यांना (वानरांप्रमाणे) वाकुल्या दाखवून चिडवू नका!” इ. इ. अशातच एके दिवशी सकाळमध्ये ’मोबाईल-चोर’ वानरास पकडल्याची बातमी छापून आली आणि आम्ही सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला! फक्त त्या धरपकडीमध्ये वानर जखमी झाले हे वाचून वाईटही वाटले. खरेच ह्या प्रकरणात झंपूचा काय दोष? केवळ मानवी वस्तीत जन्म घेतला एवढाच? असो. सध्या तरी आम्ही ’सुरक्षित दिन आ गए।’ ह्याच आनंदात आहोत!

 

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माझी दुपार ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी 

☆ विविधा ☆ माझी दुपार  ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

रोज सकाळी सूर्यनारायण आपल्या कोटी-कोटी किरणांच्या अनलशरा उधळत क्षितिजावर येऊ लागतो.त्याची कोवळी उन्हं धरेवर पसरू लागतात. ती अंगावर झेलतच दिवसाची सुरुवात होते. हळूहळू उन्हाची तिरीप अंगाला चटके देऊ लागते. तेच ऊन रणरणतं वाटू लागतं आणि दुपार रखरखीत!!

साहित्यिकांना  कवींना सकाळ, संध्याकाळचं जितकअप्रूप तितकं दुपारचं नाही हं! या सर्वांकडून उपेक्षिलेली ही दुपार!

‘वेळ झाली भर माध्यान्ह!माथ्यावर तळपे ऊन!नको जाऊ कोमेजून माझ्या प्रीतीच्या फुला’ असं एखादं कवी अनिल यांनी शब्दबद्ध केलेलं आर्त गीत जन्माला येते. हा त्याला अपवाद….

सकाळ नंतर येणारी आणि सांजेत विरून जाणारी ही दुपार माझी मात्र प्रियसखी!

‘सुख म्हणजे नक्की काय असतं , काय पुण्य असलं की जे घरबसल्या मिळतं’  या ओळी मला माझ्या या प्रिय सखीला अर्पण कराव्याशा वाटतात. कारण ती थकलेल्या माझ्या गात्रांना सुखावते.

नव्या रुपात आणि नव्या ढंगात येणारी ही माझी सखी मला रोज नवीन वातावरणात घेऊन जाते.

सकाळी उठल्यापासून कामात गुरफटलेली मी दुपारी स्वतःला तिच्यात गुरफटून घेते. तिच्या उबदार दुलईत मीच परी असते.

ती कधीकधी अलवार स्वप्न सफरीवर  मला नेते. मनावरचं मळभ दूर करून एखाद्या फुलासारखं टवटवीत करते. आणि मग, चहाचा भुरका मारून मी पुन्हा कामाला लागते.

कधीकधी मला शॉपिंग मेनिया जडतो. मी तिच्यासोबत मनसोक्त शॉपिंग करते.

तिच्यासोबत मी मनस्विनी असते. काही मनभावन वाचन करून स्वतःला रिझवते आणि अंतर्मुखही होते.

कधीतरी एखादी कविता सुचते. लिहिता लिहिता मी ती गुणगुणते. माझ्या सुरात ती गाते. तिच्यात तालात मी नाचते. कविता सजते आणि तिचा पदन्यास सुरू होतो.

तिच्यासोबत एखादा लेख लिहिते. आवडलेल्या लिखाणावर खुश होऊन स्मितहास्य करते. कधी लिहिता लिहिता भावूक होते.. डोळेही पाणावतात. मग मी तिला आणखीनच बिलगते.

माझी दुपार मला खूप काही  शिकवते. दुपारच्या शाळेत फक्त मीच शिकते.

माझ्या सर्व सख्यांनाही ती मला भेटवते. मनमोकळ्या गप्पा मारायला लावून खूप हसवते.नातेवाईकांशी संवाद साधून नात्याची वीण आणखी घट्ट करते.

हक्काचा वेळ देणारी ही दुपार मला काही फावली कामं करण्यासाठी निवांतपणाही देते. सांडगे, पापड, कुरडया, लोणची, मसाले यांनी डबे उगीच का भरतात?

कधी कधी हिच्याच संगतीनं मी गाणी गाते, एखादा सुंदर चित्रपट पाहते, स्वतःला आरशात बघून सजते आणि ‘सजना है मुझे सजना के लिए’असे म्हणून गिरकीही घेते.

Kitty party असेल त्या दिवशी  तिला माझ्यासोबत नेते. आजच्या राहिलेल्या गप्पा आम्ही दुसरे दिवशी मारतो.

रोज कामासाठी बाहेर पडणाऱ्या, नोकरी-व्यवसाय करणाऱ्या इतर स्त्रियांसाठी दुर्मिळ असणारी ही दुपार मला रोज भेटते याचा मला आत्यंतिक सुख वाटतं.

रविवारी येणारी ही दुपार थोडीशी निराळी. माझ्याबरोबरच कुटुंबात रमणारी, त्यांनाही स्वतःच्या अस्तित्वानं निवांत करणारी, सर्वांना हवीहवीशी वाटणारी असते. पुढील आठवड्यासाठी खूप-खूप ऊर्जा देणारी अशी दुपार!

दुसऱ्या दिवशी येण्याचं आश्वासन देऊन ती तिच्या वेळेला निघून जाते. बाहेर संध्याकाळ तिची वाट बघत असते. तिला ओव्हर देऊन हिला जायचं असतं ना?

प्रत्येकाची दुपार ही ज्याची त्याची वैयक्तिक प्रॉपर्टीअसते प्रत्येकानं आपल्याला हवी तशी ती वापरावी आपल्याला हवी तशी खर्च करावी  नाही का?….

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डॉ.अभिधा धुमटकर ☆ सुश्री संध्या ओक 

☆ विविधा ☆ डॉ.अभिधा धुमटकर ☆ सुश्री संध्या ओक ☆ 

लंडनची फेलोशिप मिळालेली भारतातील पहिली दृष्टिहीन महिला आणि महाराष्ट्रातील पहिली अंध व्यक्ती हा मान मिळवणाऱ्या डॉ. धुमटकर या साठ्ये कॉलजमधील इतिहास विभागाच्या प्रमुख आहेत..!

कोकणी, मराठी या घरच्याच भाषांखेरीज संस्कृत, इंग्रजी, सिंधी, बंगाली,उर्दू, इटालियन, पर्शियन, जर्मन, फ्रेंच, अरेबिक ह्या भाषांचा सुद्धा दांडगा अभ्यास असणाऱ्या अभिधा यांच्या जिद्दीची कहाणी जाणून घेऊया ’लक्षवेधी’ या सदरातून…,

“अभिधा” शब्दाचा अर्थ धारण करणारी पहिली शक्ती..!

ही गोष्ट आहे नावाप्रमाणेच वेगळेपणा जपणारी ‘अभिधा धुमटकर’  हिची.!

अभिधा आपल्या पार्ल्यातल्या… शालेय शिक्षण प्रार्थना समाज शाळेत घेतल्यानंतर तिने पार्ले कॉलेजमधून बी.ए.ची पदवी घेतली.!

पुढे पी.एच.डी.पर्यंत मजल मारली.!

सध्या साठ्ये कॉलेजमध्ये इतिहास या विषयाची ती हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत.!

ही सगळी कथा तुमच्यासमोर मांडायचं कारण, ती हे सुंदर जग पाहू शकत नाही.!

ती जन्मतःच दृष्टीहीन आहे.!

या सगळ्यावर मात करुन आज ह्या पदापर्यंत तिची वाटचाल कशी झाली त्याचीच ही लक्षवेधी कहाणी.!

अभिधा आणि तिच्या मावसबहिणी मध्ये अवघ्या 17 दिवसांचा फरक.!

ती हाक मारल्यानंतर आवाजाच्या दिशेने पहायची.!

ही मात्र डोळे फिरवायची.!

त्यावरुन आईने डॉक्टरांना हे  सांगितले. तपासल्यावर कळलं की हिला अजिबात दिसत नाही.!

खरी कहाणी इथूनच सुरू होते.!

या कोणत्याही गोष्टीचा बाऊ न करता तिच्या आईने ज्या पद्धतीने तिला घडवलयं ते खरोखरच वाखाणण्याजोगं आहे.!

त्यांनी अभिधाच्या बाबतीत घेतलेला सगळ्यात चांगला निर्णय म्हणजे तिला अंधशाळेमध्ये न घालता सर्वसामान्य शाळेत घातलं.!

त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांना समाजात वावरायचं असल्याने सर्वसामान्य शाळेतच त्यांची प्रगती होणार हे आईला पक्कं ठाऊक होतं.!

बऱ्याच शाळेतून त्यांना प्रवेशासाठी नकारघंटा येत होती.!

एका प्रख्यात शाळेतला अनुभव तर मानसिक खच्चीकरण करणारा होता.!

मुलाखतीसाठी गेल्यानंतर मुलीला दिसत नाही हे माहिती असूनसुद्धा तिला रंग व खेळणी ओळखायला दिली होती.!

पण ह्या अनुभवाच्या पाठोपाठच जगात चांगली माणसं असतात ह्याचासुद्धा त्यांना प्रत्यय आला.!

बोरीवलीच्या सुविद्यालयाने तिला आपल्यात सामावून घेतले.! प्रवेश तर मिळाला पण प्रत्येक टप्प्यावर मात्र खूप संघर्ष होताच.!

जिद्दी असलेली अभिधा होमवर्क लिहिण्यासाठी हट्ट करायची.! ‘कमळ’ शब्द लिहिताना आईला खोडरबर घेऊन स्वतः लिहिलेली एकावर एक येणारी अक्षरे खोडून पुन्हा पुन्हा नीट येईतो न थकणाऱ्या 4 वर्षाच्या अभिधाची चिकाटी पाहून थक्क व्हायला होते..! शांत डोक्याने विचार करुन, कल्पकतेने तिच्या आईने पोळपाट घेऊन गोलाची संकल्पना तिच्यासमोर मांडली आणि लाटणे मध्ये घातल्यावर त्या गोल पोळपाटाचा ‘ब’ कसा होतो ते सांगितले.! इथूनच त्यांच्यामधल्या शिक्षिकेचा कस लागला.!

अभिधा वक्तृत्त्व स्पर्धा, खेळ या सगळ्यातच हुशार होती.! आत्मविश्वास तर तिच्यात ठासून भरला होता.! शाळेत खेळाच्या तासाला सरांनी लंगडी खेळू नको, पडशील असं सांगितल्यावर अभिधा निडरपणे म्हणाली, “पडले तरी चालेल सर, माझी आई नाही विचारायला येणार.!

पण मला खेळू द्या.!’ यात मुख्य प्रश्न होता पेपर लिहिण्याचा.. तिच्या आईने पहिल्यापासूनच रायटर ठेवला होता..!

आठवीपासून काही विषय जसं कार्यानुभव, सायन्सचे प्रयोग, गणित हे साध्या शाळेत जमणार नाहीत त्यामुळे शाळेतून काढून टाकण्याचं संकट उभ ठाकलं.! पण आईने त्या सगळ्यातून धैर्याने मार्ग काढत त्याला परतावून लावलं.!

अभिधा दहावीला अंधांमधून पहिली आली.! गणितात पैकीच्या पैकी मार्क… आईच्या ह्या सगळ्या कष्टाचं सार्थक झालं.!

नववीत असताना नलिनीताई कर्वे यांनी खूप प्रेमाने रिडिंगच काम केलं.! त्या वाचून दाखवायच्या आणि आई ते सर्व रेकॉर्ड करुन ठेवायची.! नंतर अनेक लोकांनी अतिशय प्रेमाने रिडरचं काम केलं.!

अभिधाला पहिल्यापासून भाषेची खूप चांगली समज होती.!

संस्कृत, मराठी, इंग्रजी यांचं व्याकरण तर अतिशय उत्तम.!

याशिवाय इतिहास शिकवणाऱ्या सिक्वेरा सरांमुळे इतिहासाकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोनच बदलून गेला आणि ती इतिहासाकडे वळली.! पुढच्या सगळ्या पदव्या तिने इतिहास विषयातच घेतल्या.!

1883 सालीसुद्धा विज्ञान प्रदर्शन भरवणारे बाळाजी प्रभाकर मोडक यांची पुस्तकं तिच्या वाचनात आली.!

सायन्सच्या उपशाखांवर 24 पुस्तके लिहिणाऱ्या मोडकांमुळे HISTORY OF SCIENCE IN MAHARASHTRA बद्दल उत्सुकता निर्माण झाली आणि तिचा पी.एच.डी चा विषय पक्का झाला.!

हे सगळं शिकत असताना अभिधाने संस्कृत, इंग्रजी, सिंधी, बंगाली, उर्दू, इटालियन, पर्शियन, जर्मन, फ्रेंच,अरेबिक ह्या भाषांवरसुद्धा प्रभुत्व मिळवले.. शिवाय कोकणी, मराठी येतातच. ह्या सगळ्या भाषा तिला अस्खलित येतात.! एम.ए.,बी.एड.,सेट,नेट पूर्ण झालेलं एम.फील.चालूच होतं.! नोकरीसाठी पण प्रयत्न चालू होते.!

पण अंध म्हणून नकार मिळत होते.! ती खूप खचून जायची.!

पुढे तिने घरी संस्कृतच्या ट्यूशन घ्यायला सुरुवात केली.!

नंतर चाटे क्लास मध्ये फ्रेंच शिकवायला सुरुवात केली.!

ग्रँटरोडपासून अंधेरीपर्यंतच्या त्यांच्या सगळ्या शाखांमध्ये दिवसभर जाऊन अभिधा शिकवत असे.!

रीडर नसल्यामुळे पी.एच.डी. पूर्ण होईल की नाही ही शंका तिला वाटत होती.! पण गाईड डॉ. मरीयम डोसल आणि प्रो.जे.व्ही.नाईक यांच्या मार्गदर्शनामुळे अभिधाला पी.एच.डी. मिळाली.!

पुढे 2010 मध्ये साठ्ये कॉलेजमध्ये नोकरीसुद्धा मिळाली.! 2014मध्ये इतिहासाच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट पदाची जबाबदारी स्वीकारली.!

श्रीलंका आणि ग्लासगोला कॉन्फरन्स साठी आमंत्रण तसेच लंडनला चार्ल वॉलेर इंडिया ट्रस्ट तर्फे शॉर्ट टाइम रिसर्च फेलोशिप मिळणं तिच्या यशात मानाचे तुरे खोचत गेलं.!

फेलोशिपसाठी लंडनला जायचं तर इथून रीडर नेण खूपच खर्चिक होणार होतं.! त्यामुळे तिथल्या रीडरची गरज होती.! अगदी जायच्या दिवसापर्यंत रीडरची सोय झाली नव्हती.!

पण अनपेक्षितपणे मिळालेल्या मदतीमुळे ते सुकर झालं.!

लंडनमधील रीडरना मेल पाठवणं, त्यांची नावं, वेळ एक्सेल शीटमध्ये घालणं, सगळ्यांचा व्हॉट्स App गृप करुन त्यांच्या संपर्कात राहाणं आणि अभिधाच्या बॅग्ज भरुन देण्यापर्यंतची महत्त्वाची कामं तिच्या धाकट्या बहिणीनं समिधाने केली.! सांगायची गोष्ट म्हणजे समिधाही अभिधासारखीच दृष्टीहीन आहे.!

ती सुद्धा एसएनडीटीत नोकरी करते.!

सकाळी सगळा स्वयंपाक करुन चर्चगेटला लोकलने जाते. तिचेही कौतुक करावे तितके थोडेच आहे.!

दोन दृष्टीहीन मुली पदरात असताना, जोडीदार अकाली सोडून गेला तरीसुद्धा न डगमगता अतिशय हुशारीने, धैर्याने अभिधाच्या आईने ह्या दोन मुलींना समर्थपणे आयुष्यात उभं केलं.! त्यांच्या ह्या जिद्दीला आदरयुक्त प्रणाम.!

आभिधाचे 14 रिसर्च पेपर “इकॉनॉमिक अँड पोलिटिकल विकली”, “इंडियन जनरल हिस्ट्री ऑफ सायन्स”, “इंडियन कॉग्रेस हिस्ट्री प्रोसिडिंग”, “इन्स्टिट्यूट ऑफ हिस्ट्रॉरिकल रिसर्च” अशा नावाजलेल्या पेपरमध्ये आणि संस्थांमध्ये वाचले गेले.!

लंडनची फेलोशिप मिळालेली भारतातील पहिली दृष्टीहीन महिला आणि महाराष्ट्रातील पहिली अंध व्यक्ती हा मान मिळवणाऱ्या अभिधाला पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा..!

 

© सुश्री संध्या ओक

मो 9833247387

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उखळ ! ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

 ☆ विविधा ☆ उखळ ! श्रीमती अनुराधा फाटक  ☆ 

कांडण्यासाठी दगड खोदून अगर लाकडाचा ओंडका पोखरून जो खोलगट भाग तयार करतात त्याला उखळ म्हणतात.प्राचीन काळापासून या उखळाचा वापर होत आहे.यंत्रयुगात उखळाचा वापर साधन म्हणून कमी झाला असला तरी साहित्यातील उखळ मात्र अजूनही अस्तित्वात अहे

परिस्थितीने गरीब असणाऱ्यांच्या घरी उखळाला काम नसते कारण उखळात घालून कुटण्याइतकेसुध्दा त्यांच्याजवळ नसते पण अशा माणसाचे जर दैव उघडले,

अचानक त्याला वैभव प्राप्त झाले म्हणजेच त्याचे उखळ पांढरे झाले तर मात्र त्यांच्या घरात असणाऱ्या उखळाची मुसळाशी बांधलेली गाठ कधीच सुटत नाही म्हणजे त्यांच्या घरात सतत राबता सुरु होतो.

गरिबांची अशी होणारी उखळ प्रगती (भरभराट)काही दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना बघवत नाही. अशी माणसे उखळ पांढरे झालेल्या लोकांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढतात.त्यांच्या अत्याचाराचे घाव गरिबांना सोसावे लागतात.उखळाशी गाठ पडण्याचा हा प्रकार बऱ्याचवेळा घडतो.

सरळमार्गी जीवन जगणाऱ्या लोकांनाही बऱ्याचवेळा उखळात डोके घालण्याची वेळ येते म्हणजे जीव धोक्यात घालावा लागतो.एकदा उखळात डोके गेल्यावर मुसळाला न घाबरण्याच्या स्वभावाची अशी माणसे उखळात घातले तरी घाव चुकविण्याची तयारी ठेवतात,संकटातून सहीसलामत बाहेर पडण्याची तयारी ठेवतात.

 

© श्रीमती अनुराधा फाटक

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मन ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी

सुश्री दीप्ती कुलकर्णी

शिक्षण: बी.एस.सी., बी.एड.फर्स्ट क्लास फर्स्ट. PGDEPM.

व्यवसायः सेवानिवृत्त पर्यवेक्षक, पन्हाळा वि. मं.पन्हाळा.

छंद : वाचन, लेखन, व्याख्यान, कथाकथन.

लेखनः 1. चैतन्य काव्यसंग्रह 2. असे शोधः असे संशोधक भाग १ आणि भाग २ ही वैज्ञानिकांची चरित्रे प्रकाशित. 2012.

मराठी निबंधालय, पर्यावरण शिक्षण,लिहू आनंदे -अशा अनेक पुस्तकात लेख.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून काव्यवाचनाचे वीस कार्यक्रम.

पुरस्कार –

राज्यस्तरीय निबंध लेखनात प्रथम, द्वितीय असे पाच क्रमांक.

1. रोटरी क्लब आँफ कोल्हापूर-सनराइज द्वारा सनराइज आदर्श शिक्षक पुरस्कार  2.लायन्स क्लब इंटरनँशनल-कोल्हापूर विभागाकडून आदर्श शिक्षक पुरस्कार २००५। 3.जनस्वास्थ्य दक्षता समिती, कोल्हापूर, सन्मान पत्र.

याखेरीज वर्तमानपत्रे,मासिके, दिवाळी अंकातून लेखन चालू.

☆ विविधा ☆ मन ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी☆ 

दोनच अक्षरी शब्द मन! पण या शब्दाची व्याप्ती मात्र अमर्याद. त्याचा आकार तरी कसा वर्णावा बरे? ते हीअवघडच. कधी मनखसखशीएवढं तरकधी त्याहून सूक्ष्म अणुरेणू एवढं बनतं. तरकधी त्या विशालकाय आकाशातही मावणार नाही इतकं प्रचंड रूप धारण करू शकतं. मन इतकं लहरी असतं कि कोणी त्याचा हातच धरु शकणार नाही. कधी मन स्वच्छंदीपणे विहरतं तर कधी विचारी बनतं. कधी ते गूढ अर्थ शोधण्यास सज्ज होतंनि झपाटल्यासारखं एखाद्या गोष्टीच्या मागं लागतं. कधी हेच मन घमेंडखोर बनतं नि बढायांना गोंजारु लागतं. कधी हेच मन उत्साही बनतं नि नवनिर्मिती करु पाहतं.कधी ते लाडिक बनतं नि प्रिय व्यक्तीस, सवंगड्यास लाडाने हाकारु पाहतं तर काही वेळा तुसडं बनून अगदी सर्वांनाच दूर-दूर लोटू पाहतं. कधी मन स्वप्नाळु बनतं नि दिवास्वप्न रेखाटू लागतं.तर कधी कधी दुःखी बनून अश्रू साठ वित राहातं.असंहे बहुरंगी भावार्थ साठविणारं मन.याविषयी बोलावं तेवढं थोडच म्हणूनच

श्रीसमर्थ सुद्धा करुणाष्टकात म्हणतात-

अचपळ मन माझे नावरे आवरिता।

तुजविण शिण होतो धाव रे धाव आता।।

खरच हे अचपळ मन ताब्यात ठेवण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न केले पाहिजेत. कारण असं म्हणतात कि-मन जिंकी तो जग जिंकी.

मनावर चांगले संस्कार होण्यासाठी आपण घरातूनच लहानपणापासून शुभं करोती, देवाची स्तोत्रे, परवचा असे संस्कार घेत आलो आहोत. कुठलीही गोष्ट

प्रथम मनात आली तरच तिचा विचार होऊन पुढे आपण त्याप्रमाणे क्रुती करतो. कोणतीही गोष्ट शक्य होण्यासाठी प्रथम मनात आणावी

लागते.म्हणूनच आपण मनावर सुसंस्कारांचे धडे बिंबविले तरच या सम जात सह्रुदय, संवेदनशील व्यक्ती निर्माण होतील. एकनाथ महाराजांनी गंगेची कावड तहानलेल्या गाढवाच्या मुखी सोडली.अशा गोष्टीतून भूतदया कशी दाखवावी हे मुलांना सांगता येते.

म्हणूनच मन चांगल्या संस्कार ांनी विकसित केले तर भावी पिढी सद्वर्तनी ,सुशील आणि सेवाव्रती  बनेल. त्यामुळे लाँकडाउनच्या या काळात घरी बसून काम करण्याची संधी ही सुसंधी मानली तर मुलांशी सुसंवाद साधणे सोपे होईल.वाचनाची आवड त्यांच्या मनात निर्माण करता येईल.श्री समर्थांनी मनाचे श्लोक

रचले आहेत ,यामागे हाच हेतू आहे.आपलं मन स्वच्छ, शुद्ध, पारदर्शक ठेवले नि योग्य विचार मनात आणले तरच आपली योग्य दिशेने प्रगती होईल यात शंकाच नाही.

सर्वात महत्वाचं म्हणजे अगदी कोणत्याही वयात मनावर नियंत्रण ठेवलं पाहिजे त्यामुळे योग्य निर्णय घेता येतो. सकारात्मक विचार ातूनच मनाची उत्तम मशागत होते.चला तर कोणतीही गोष्ट मनापासून करु या नि यश मिळवू या.

 

© सुश्री दीप्ती कुलकर्णी

कोल्हापूर

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares
image_print