मराठी साहित्य – विविधा ☆ भाई… भाग – 4 ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ विविधा ☆ भाई… भाग – 4 ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

 

*तुला शिकवीन चांगलाच धडा*

पुढची ओळ  काय बरं ?

तुला शिकवीन चांगलाच धडा,

समीक्षक आहेस  ना तू ?

मग  माहितीही पाहिजे खडान,खडा

कोण आहे ?

मी सुनीता  देशपांडे

अहो , सुनीता बाई ? तुम्ही स्वतः ?

हो. आश्वर्य वाटलं? ? भाई येऊ शकतात , तर मी नाही ?

नाही तस नाही.

भाई – उत्तरार्ध ची जहिरात बघितलीस?

हो हो बघितली, ती फुलराणी आठवत होतो, ‘तुला शिकवीन चागला धडा’.

हं  ८ तारखेनंतर दुसरा भाग बघशील, त्यावर मग परीक्षण/समीक्षा ???  लिहिशील.म्हणलं त्या आधीच  तुझी शाळा घ्यावी. काही हरकत ?

छे!  मी कोण हरकत घेणारा ?  चूक समजली की सुधारायला मदतच होते की .साक्षात  ‘ बाळासाहेब  ठाकरें’ ना  वर्गाबाहेर उभे करणा-या तुम्ही , माझी हिम्मत तरी  आहे का तुम्हाला नाही म्हणायची ?

हं, प्रासंगिक विनोद निर्मिती  करताना ही  वास्तविक  विचार  करता आला पाहिजे. त्यावेळी वर्ग चालू असताना ‘ वहीत ‘ व्यगंचित्रे काढणारा तो  खरोखरच ‘ बाल’ ठाकरे माझा विद्यार्थी  होता. त्याचे ‘ बाळासाहेब’ नंतर झाले होते.

बरं, दाखव   ते तू मागे लिहिले दोन भाग – भाईं वरचे

हो  हो , घ्या  हे घ्या मोबाईल .अनुदिनीत मी लिहिलेले कायम ठेवतो मग मिळायला सोपे जाते .

नाही मला लिखित स्वरूपातले पाहिजे आहे.

कागदावर  लिहिलेले  लेखन  माझ्याकडे नाही. जे काही असेल ते  मोबाईलवरच करतो.

आणि मग  झालेल्या शुध्द्व लेखन , व्याकरणाच्या चुका तशाच राहतात. इतरही  पुढे ढकलणारे  चुका दुरुस्त न करता  तसेच पाठवतात. काय गडबड आहे  एवढं प्रसिध्द व्हायची ? आम्ही एखादी गोष्ट , लेख  लिहायचो, चारदा तपासायचो मग पोस्टाने  संपादकांना पाठवायचो मग त्यांच्या उत्तराची वाट बघायचो. खुप वेळ जायचा आणि मग उत्सुकता ही रहायची छापून यायची.  ती मजा तुमच्या पिढीला नाही. आलं मनात,  लिहिलं, टाकले फेसबुक,  Whatsapp वर

जे लिहितात ते नीट कागदावर लिहा, तपासा. असा पेपर संग्रही राहतो , वेळप्रसंगी परत लगेच मिळतो , आवश्यक बदल करता येतात.  लावून घ्या ही सवय.

हो हो सुनीता बाई.

कितीही काल्पनिक लेखन असलं तरी  ज्या व्यक्तीवर आपण लिहीत आहोत त्याच्या मुळ स्वभावा विरुध्द्व चे चित्र सादर करणे/ लिहिणे चुकीचेच. अशा लेखाची
‘हवा आठवड्यातून फारतर  दोन दिवस  राहते’. कायमस्वरुपी नाही

हं , एखादे उदाहरण द्याल ?

हे बघ तुझा लेख.

स्वर्गात मी आणि भाईं मधील चर्चा खुमासदार झालीय यात शंकाच नाही . पण मी भाईंना म्हणते भाई लवकर निघून पर्वतीवर जाऊया , सारसबागेतील गणपतीला जाऊ या ?
मी म्हणते तसं वय्यक्तिक संदर्भ इथे येतात.

अरे  भाईच्या अखेरच्या घटका शिल्लक असतानाही मी कधी ‘देव’ आठवला नाही , सत्यनारायणाचा ‘प्रसाद’ ही मी निव्वळ ‘शिरा’ म्हणून खाल्ला आणि तू मला सरळ सारसबागेतल्या देवळात घेऊन गेलास ?  ही मोठी विसंगती, चूक

हो हो आलं लक्षांत.

त्या पेक्षा  पुण्यातील एका परिसंवादाला हजेरी लावू, किंवा  एखादं मस्त नव्या कलाकारांच नाटक बघू  हे चाललं असत रे.

हो हो खरं आहे तुमचं

परीक्षण करताना  किंवा समीक्षा करतां ऋण / धन दोन्ही बाजूचा विचार केला पाहिजे . एकाच बाजूने लिहिणे बरोबर नाही ना ?

खरं आहे पण सिनेमात ऋण बाजू अशी वाटली नाही

का नाही ?  काही जणांनी त्यावर लिहिलं की

कशाबद्दल बोलताय , कळलं नाही

हेच  भाईंचे  सिगरेट ओढणे, ड्रिंक्स घेणे, त्यासाठीची धावपळ. याची आवश्यकता होती का नव्हती?  असेल तर का ? नसेल तर का नको?याचा सर्वसमावेशक विचार परीक्षण लिहिताना व्हायला पाहिजे.

मात्र हे दाखवलेले कितपत खरं आहे याची ‘ सत्यता’ समजणे फार अवघड आहे. मग यातून वाद – विवाद अटळ.

खरं आहे.

तुम्ही जेव्हा बायोपिक सारखे सिनेमा करिता तेव्ह्या व्यक्तिगत आयुष्यातले कांगोरे कितपत दाखवावे आणि नेमके कशावर फोकस करावा  हे  ठरवणे फार अवघड जाते
नुकतेच सगळ्यांनी पाहिलेले एक ‘कडक’  उदाहरण म्हणजे

‘ आणि डाॅ काशिनाथ घाणेकर .  . . .

हा सिनेमा आहे तसा स्वीकारला गेला कारण सिनेमात

व्यसना संबंधीत दाखवलेल्या गोष्टी आणि प्रत्यक्ष जीवनातील गोष्टी  मिळत्या जुळत्या होत्या. निदान तशी माहिती अनेकांना होती. मात्र भाई सिनेमातील प्रसंग  आणि दाखवलेली पार्श्वभूमी तशी ब-याच जणांना धक्कादायक वाटून गेली. याचे योग्य प्रतिबिंब एक समिक्षक म्हणून लिहिलेल्या लेखात यायला पाहिजे.

चल निघते मी,  दुस-या भागात विजया ताईंनी ‘ सुंदर मी होणार ‘  ची आठवण सांगितली आहे तसे आता तू  ही ठरव

‘सुंदर मी लिहिणार  ‘ . शुभेच्छा

धन्यवाद सुनीता बाई ?

©  श्री अमोल अनंत केळकर

१६/१/१८

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भूगोल दिन १४ जानेवारी ☆ सौ. वीणा आशुतोष रारावीकर

सौ. वीणा आशुतोष रारावीकर

सौ. वीणा आशुतोष रारावीकर यांनी संगणक तंत्रज्ञान, व्यवस्थापन व पदार्थविज्ञान या विषयात उच्चशिक्षण घेतले आहे.  एक लोकप्रिय ललित लेखिका म्हणून त्यांचे विविधांगी लिखाण नामवंत वृत्तपत्रे व मॅाम्सप्रेसो या ब्लॅागसाइटवर प्रकाशित झाले आहे. अनेक कथा, लघु कथा, लेख, कविता, पुस्तक परिक्षण, अर्थगर्भ सुविचार, शब्दांकन, कलाकृती असे साहित्य प्रकार त्यांनी हाताळले आहेत. त्यांच्या स्वतःच्या साहित्य वाचनाचे रेडिओवर कार्यक्रम होत असतात. अर्थगर्भ लिखाण करणाऱ्या या लेखिकेला योगाभ्यास, पर्यटन, वाचन, क्रीडा प्रकार आणि टपाल व चलन संग्रह यातही रुची आहे.

☆ विविधा ☆ भूगोल दिन १४ जानेवारी ☆ सौ. वीणा आशुतोष रारावीकर

 

ऐरोली-ठाणे खाडीकिनारी ‘फ्लेमिंगो’ नी बहरलेले दृश्य बघायला छोटी शर्वरी आपल्या आई-बाबां बरोबर गेली होती. पांढरे गुलाबी उंच पक्षी बघून तिला खूप आनंद झाला होता. तिचे प्रश्न चालू झाले, “आई, हे पक्षी कुठून आले? हे किती दिवस इथे राहाणार? मग आपल्या घरी ते परत कधी जाणार? आपण गावाला गेलो की असे दोन महिने कुठे राहातो?” आईला मात्र फ्लेमिंगो आणि त्याबरोबर सेल्फी काढण्यात जास्त रस होता.

“भूगोलाचे ज्ञान हे शाळेत परिक्षेत पास होण्यासाठी मिळवलेले मार्क” अशी समजूती असलेली तिची आई, गौरी. अशा समजूतीत असणारी गौरी ही काही एकटी नाही. भूगोल हे एक शास्त्र आहे आणि त्याला विज्ञान शाखेतील पदवी मिळते. हे देखील अनेक जणांच्या गावी नसते.

अशा पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रात चौदा जानेवारी हा दिवस भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो, याची किती जणांना कल्पना आहे?

कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजचे माजी प्राचार्य आणि राज्यातील थोर भूगोलतज्ज्ञ सी. डी. देशपांडे एक

प्रख्यात व्यक्तिमत्व. त्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ, त्यांच्या जन्मदिनी दरवर्षी १४ जानेवारी हा दिन ‘भूगोल दिन’ साजरा करायचा असे ठरले. त्याप्रमाणे पुण्याचे डॉ. सुरेश गरसोळे यांनी राज्यात ‘भूगोल दिन’ साजरा करण्याची प्रथा १४ जानेवारी १९८८ पासून सुरू केली.

भूगोलाला इंग्रजीमध्ये Geography (जिओग्राफी) म्हणतात. या शब्दाची उत्पत्ती ग्रीक भाषेतील शब्द Geo चा अर्थ Earth किंवा पृथ्वी आणि Graphiya म्हणजे graphein या शब्दाचा अर्थ वर्णन करणे किंवा लिहिणे असा होतो. या वरून आपल्या लक्षात येते की पृथ्वी आणि तिच्या वैशिष्ट्यांचा, तिच्या वरील जैवविविधतेचा आणि मानवी उत्क्रांतीचा आणि तिच्या कार्यांचा अभ्यास करणे हा भूगोलाचा उद्देश आहे.

मराठीतला भूगोल हा शब्द संस्कृतमधून जसाच्या तसा घेतला आहे. भूगोल म्हणजे पृथ्वीचा गोल आणि त्याचा अभ्यास या अर्थानेही वापरला जातो.

शाळेत असताना गणिताबरोबर सर्वात नावडीचा दुसरा विषय कोणता, यावर बहुतेक सर्व लोकांचे एकमत होईल, तो म्हणजे भूगोल. शाळेत भूगोल शिकवणारा शिक्षक हा तोच विषय घेऊन पदवीधर झाला असेल, हे त्याहून कठिण. मग हा विषय नेहमीच उपेक्षित राहिला, तर त्यात नवल काय?

भूगोल शाळेत शिकतो तसा फक्त राजकीय भूगोलाशी मर्यादित नसतो तर त्याच्या अनेक उपशाखा आहेत.  वस्ती भूगोल (settlement geography ) हवामानशास्त्र (climatology ) आर्थिक भूगोल (economic geography ) लष्करी भूगोल (military  geography ) सागरशास्त्र (oceanography), जंगलशास्त्र (forest geography), जैवशास्त्र (biogeography), शेतीविषयक (agriculture), तसेच मानवीशास्त्र. या सर्व शाखांचा आपल्या दैनंदिन जीवनात, राज्याच्या नियोजन आणि विकास क्षेत्र तसेच देशाच्या सीमासुरक्षेतेसाठी देखील उपयोग होत असतो.

असा हा भूगोल अनेक क्षेत्रात उपयोगी पडणारा आणि त्यामधे नोकरी – व्यवसायाच्या संधी असणारा. यामधील काही संधी – कारटोग्राफी (cartography) – नकाशे बनवणाऱ्या व्यक्ती, सव्‍‌र्हेअर – भूमापन, सर्वेक्षण करणे,  ड्राफ्टर, शहर नियोजन, शासकीय कर्मचारी – केंद्र किंवा राज्य सरकारच्या भूविकास, भूनियोजन, भूमापन, भूजलविकास विभाग,  जीआयएस (जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम) स्पेशालिस्ट, क्लायमेटोलॉजिस्ट – हवामानतज्ञ, वाहतूक व्यवस्थापक, पर्यावरणीय व्यवस्थापन, पर्यटन , डेमोग्राफर – केंद्रीय जनगणना कार्यालय. जी.आय.एस, जी.पी.एस यामधे झालेली प्रगती व त्याची गरज आपल्याला वेगळ सांगायची गरज नाही. यावरुन भूगोल विषयाचे महत्व अधोरेखीत होते.

चौदा जानेवारी म्हणजे सूर्याच्या संक्रमणाचा दिवस. मकर संक्रातीचा दिवस यापलीकडे जाऊन तो भूगोल दिन म्हणून साजरा होतो, याची जाणीव सर्वांना व्हावी ही इच्छा. नाही तर आपला भूगोल फक्त प्लस्टीकचा वापर टाळा किंवा गुगल मॅपवर लोकेशन लावण्या पुरताच मर्यादित असतो आणि बाकी सगळा गोल… असं नको व्हायला, म्हणून हा प्रपंच.

©️ सौ. वीणा आशुतोष रारावीकर

लोअर परेल, मुंबई

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 81 – लेखनाने मला काय दिले …. ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 81 ☆

☆ लेखनाने मला काय दिले …. ☆

(मैं निःशब्द हूँ और आपका आभारी भी हूँ ।  ई-अभिव्यक्ति मंच को मराठी साहित्य में एक स्थान दिलाने में  आपका साहित्यिक सहयोग अविस्मरणीय है।आज इस श्रृंखला में यह आपकी गौरवपूर्ण  81वीं रचना है। हम आपसे ऐसे ही साहित्यिक सहयोग की अपेक्षा करते हैं । आपकी लेखनी को सादर नमन ??)

आपण ब-यापैकी लिहितो हे मला शाळेत असतानाच समजले, आठवीत असताना मी वर्गाच्या हस्तलिखीतासाठी पहिल्यांदा एक हिंदी कविता आणि मराठी कथा लिहिली होती, नंतर अकरावीत असताना माझ्या हिंदी निबंधाचं बाईंनी खुप कौतुक केलं!

शाळेत असतानाच हिंदी कविता प्रकाशित झाल्या, रेडिओ लिसनर्स क्लबच्या रेडिओ पत्रिकांमधून! त्या कविता आवडल्याची झुमरी तलैय्या, राजबिराज (नेपाल) अशी कुठून कुठून पत्रं आली होती.

छापील प्रसिद्धी मला खुप लवकर मिळाली, कथा/कविता आवडल्याची पूर्वी पत्रे येत नंतर टेलिफोन – मोबाईल वर लोक आवर्जून कौतुक करतात. खुप छान वाटतं, युवा सकाळ, प्रभात,  चिंतन आदेश या साप्ताहिकातून सदरे लिहिली त्या लेखनाने खुप आनंद दिला, आकाशवाणी वरच्या श्रुतिका लेखनाने प्रसिद्धीआणि पैसा दोन्ही मिळालं, स्वराज्य मधल्या कवितेचं ऐंशी साली दहा रूपये मानधन मिळालं (ते आयुष्यातलं पहिलं मानधन) तेव्हा खुप आनंद झाला होता.

लेखनाने मला आयुष्यात बरेच मोठे समाधान दिले आहे, मान मिळाला, अल्प स्वल्प का होईना मानधन मिळाले, स्वतःची ओळख निर्माण करता आली. मुख्य म्हणजे  अनेक संस्थांनी लेखिका, कवयित्री, गजलकार म्हणून नोंद घेऊन पुरस्कारही दिले!

सध्या ई अभिव्यक्ती वरचे लेखनही खुप समाधान देत आहे, मला ही संधी दिल्याबद्दल हेमंतजींचे आभार!

खरोखर लेखणी ने आयुष्याचे सार्थक केले, मी ज्या सामाजिक गटातून आले आहे तिथे इथवर येणं खुप मुश्किल होतं, त्या काळात बाईचं अस्तित्व चार भिंतीत बंदिस्त होतं आणि मी ते स्विकारलं होतं, अपेक्षा नसताना,फार आटापिटा न करता हातून लेखन झाले ही नियतीची कृपा!

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वृद्धत्व … ☆ सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆  विविधा ☆ वृद्धत्व … ☆ सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆ 

 

‘जगाच्या पाठीवर’ सिनेमातील ‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे…’ गाणं ऐकलं की मनुष्याच्या तीन अंकी जीवन नाटयाचा पडदा अलगद डोळ्या समोर उलगडत जातो. बालपणातील निरागसता, तारुण्यात आल्यावर रंगीबेरंगी आयुष्याचा उपभोग घेते आणि तीच वृद्धत्वाकडे झुकू लागली की, आपल्या जीवनाची गत साले उलगडू लागते.मागे वळून पाहताना….. या सदरात पन्नाशी पासूनचा माणूस सतत डोकावू लागतो भूतकाळात!

बालपण, तरुणपण आणि वृद्धत्व या माणसाच्या जीवनातील तीन अवस्था गदिमांनी त्यांच्या काव्यात किती सहजतेने दाखवून दिल्या आहेत!

गदिमांचे अर्थपूर्ण काव्य मनाला भावते. .आज सत्तरीला आलेला मनुष्य ही  बरेच सुखाचे आयुष्य उपभोगतोय, पण  काही दशकांपूर्वी हे वृद्धत्व इतके सुखाचे नव्हते.मोठा कुटुंबकबिला, आर्थिक अडचणी, आजारांवर फारसे उपचार नाहीत अशा काळात हे वृद्धत्व अतिशय त्रासदायक होत असेल बहुतेक! सध्या माझ्या डोळ्यासमोर माझी आई 92 वर्षाची आहे तिचा जीवनपट येतो, कारण त्यांच्या पिढीने देशाचे पारतंत्र्य, स्वातंत्र्य अनुभवले तसेच कुटुंबासाठी खूप खस्ता खाऊन आता चांगले आयुष्यही उपभोगले, मुले  नातवंडे च काय पण पंतवडे बघण्याचे भाग्य ही तिला मिळाले. खरोखरच पिकल्या पानासारखे आयुष्य आहे तिचे आता,पण अजूनही तिच्या चेहऱ्यावर तोच जगण्याचा उत्साह बघते तेव्हा खूप आश्चर्य वाटते ही जगण्याची उमेदच त्यांचे आयुष्य वाढवत असेल! आताच्या काळात छोट्या छोट्या गोष्टींनी ढासळणारी मने आणि आणि त्यामुळे होणाऱ्या आत्महत्या पाहिल्या की  वाटते किती कमकुवत झाली आहेत माणसं!

निसर्गाचे एक संकट आलं की आपण कोसळून जातो. मग ते वादळ असो की पूर असो की करोना असो. प्रत्येक संकटाचा मनाला बाऊ वाटतो. त्यातून वर्तमानपत्र, टीव्ही यामुळे तर आपण जगालाच घरात निमंत्रित करून घेतले आहे की ज्यामुळे आपण आपली मनःशांती च घालवतो. काहीवेळा वाटतं अज्ञानात सुख असतं म्हणतात तेच खरं! पूर्वी पंचक्रोशीतील एखादी चांगली वाईट गोष्ट  कळायला सुद्धा तीन-चार तास लागत असत आणि आता आपण लांब अंतरावर चा प्रत्येक क्षण सुद्धा त्या क्षणी पाहू शकतो, चांगला किंवा वाईट!राम मंदिराच्या पायाभरणी समारंभ नरेंद्र मोदीजीं चा हस्ते कसा घडत होता ते दृश्य आपण टीव्हीसमोर बसून पाहू शकलो आणि काही काळ आपण आपले काम बाजूला ठेवून राम राज्याची स्वप्ने पाहिली. हे राम मंदिर आपण लवकरच पाहू असा विश्वास वाटला.

वृद्धत्व काहीवेळा मनाचेच जास्त असते. काही अवयव नसलेली माणसे आपल्या आयुष्यात जिद्दीने उभी रहाताना पाहिली की वाटते आपल्याला परमेश्वराने सर्व काही दिले असतानाही आपण मनानेच वृद्ध होतं जातो त्याउलट हात-पाय नसणारी तर कुणी मुकी बहिरी माणसे परमेश्वराला आव्हान देतात आणि स्वतःला काम करायला उद्युक्त करतात.97 वर्षाचे बाबासाहेब पुरंदरे नव्वद वर्षाच्या लतादीदींना म्हणतात की तुमची शंभरी पहायला, तो सोहळा अनुभवायला मी असेन तेव्हा खरोखरच त्यांच्या जिद्दीला आणि आशावादाला सलाम करावा वाटतो!या वयात गड चढणारे मनाने तरुण बाबासाहेब त्यांना वृद्धत्वाचा स्पर्शच झालेला नसतो.!

नकारात्मक  किँवा काही प्रमाणात पॅसिव्ह वृत्ती असणाऱ्या व्यक्तींना वृद्धत्व लवकर जाणवायला लागते असे मला वाटते. Positive विचाराचा माणूस जीवनाकडे नेहमी आशावादी वृत्तीने बघतो म्हणूनच तो अधिक उत्साहाने आयुष्य  उपभोगतो हेच खरे! निसर्गाचा आपण एक भाग आहोत त्यामुळे निसर्ग क्रमानुसार उत्पत्ती स्थिती लय हे आपल्या साठी आहे च! त्याची जाणीव असावी पण सतत आपण काय जाणारच आहोत या भावनेचे वृद्धत्व मनात ठेवू नये. निसर्गात बी रुजते,रोप येते, त्याचेच पुढे झाड बनते. फुले फळे येतात. हळूहळू पाने पिवळी पडू लागतात आणि गळतात कालांतराने ज्याचे जेवढे आयुष्य त्याप्रमाणे झाडाचे आयुष्य संपते आणि मातीत विलीन होते. तसेच आहे आपलं आयुष्य! वृद्धावस्था ही बिकट असली तरी मनाने तिचा स्वीकार करून आहे ते आयुष्य आनंदात घालवण्याची किमया ज्याला जमली तो वृद्धत्व चांगल्या तर्हेने घालवू शकेल! मागच्या पिढीतील बऱ्याच वृद्धांकडे पहाताना मी अधिक डोळसपणे विचार करते आणि यापुढील आयुष्याचा स्वीकार करण्यासाठी मनाला तयार करते! आई कडील आठ-पंधरा दिवसाच्या या वास्तव्यात त्या लहान झालेल्या देहाच्या कुडीतील ही ऊर्जा पाहून माझ्या मनात वृद्ध त्वाचे असंख्य विचार उमटले त्यातून लिहिलेले हे विचार स्पंदन!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भाई… भाग -2☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ विविधा ☆ भाई… भाग -2☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

“कटाप्पाने बाहुबली को क्यू मारा?”

या शेवटच्या वाक्यात ‘बाहुबली भाग- २ ची बीजे रोवली होती आणी भाग- २ येणार हे नक्की होते.

*”भाई”  वरचा लेख व्हायरल झाल्याचे लक्षात आल्यावर* टुकार लेखकाचे कौतुक करायला अनेकजण पुढे आले.  टुकार लेखकाच्या लक्षात आले की भाई- भाग २ ची बीजे पहिल्या लेखात आहेतच की,  मग काय .

लिहायचे निमित्य बाकी काही नाही. (नाहीतर लिहायची हिंम्मत तरी झाली असती का? , आता या टुकार लेखकाला कसे समजवायचे की भाग- १ चीच हवा जास्त होते. २,३ वगैरे कामाचे नसतात. असो ).

तर पहिल्या भागात, भाईं सुनिताबाईंना सांगत होते की बरं झालं अत्रे ढाराढूर झोपले होते नाहीतर सकाळी आपल्याला विडंबन रुपी  गाण्याचा ‘झेंडूच्या फुलांचा’ हार  मिळाला असता.

मंडळी, अत्रे अजिबात झोपले नव्हते बरं का.   त्या दोघांचे बोलणे आचार्यनी सगळे ऐकले.  भाई आणि सुनिताबाईं पुण्याला गेल्यावर “फाॅर अ चेंज” अत्रे भाईंच्या खुर्चीत बसले आणि त्यांनी झेंडूच्या फुलांचा हार विणायला घेतला.

चाल:  बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला)

भाई भाई,  व्यक्ती वल्लीचा कसा सिनेमा घडला.
भाई भाई ….

चिमणा गटणे, साहेब रावा
चिमण्या थेटरात, “म्हैस” थांबवा
चिमणी पोर , घेऊन गाडी
हेल्मेट घालते, आपल्या नव-याला
चिमणं चिमणं “सिंबा” थांबवलं ,त्याही थेटरला

भाई भाई,  व्यक्ती वल्लीचा कसा सिनेमा घडला.
भाई भाई ..

शिलेदार ‘महाराष्ट्र भूषण’ माझा, थोर असा साहित्याचा राजा
भोळा भोळा जीव माझा जडला त्याच्या कलेला .

‘आहे मनोहर तरी’ पसारा, खेळ पाहुनी जीव रंगला
गोजिरवाणी  जुगलबंदी, वाजवितो भाई पेटी गाण्याला
येडं यडं मन येडं झालं पाहून “भाईला”

भाई भाई,  व्यक्ती वल्लीचा कसा सिनेमा घडला.
भाई भाई ..

आज सकाळी पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावर क्र-१ वरुन सुटणा-या “दख्खनच्या राणीने” आपल्या नियोजीत वेळेत एक शिट्टी जोरात मारून मुंबई कडे झेप घेतली. आज तिला माहित होते की गाडीत अख्या मराठी सृजनांचे लाडके “भाई आणि सुनिता बाई ” विराजमान आहेत. तळेगावत ते लोणावळा धुकं जास्त असल्याने राणीला मुंबईला पोहोचायला थोडा उशीरच झाला पण मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर ‘धावपट्टीच्या’ कामासाठी मेगा-ब्लाॅग घेतल्याने भाईंचे पुष्पक थोडे उशिराच सुटणार होतं त्यामुळे काळजीचे काम नव्हतं.

इकडे आचार्य झेंडूच्या फुलांचा हार हातात घेऊन स्वर्गाच्या प्रवेशद्वारावर दोघांच्या स्वागतासाठी  ‘ भाई’ अजून कसे आले नाहीत म्हणून येरझा-या घालत आहेत.

*पु. ल देशपांडे जन्मशताब्दी वर्षानिमित्य,  लाडक्या भाईंना टुकार लेखकाकडून ही लेखनांजली समर्पित* ?

©  श्री अमोल अनंत केळकर

५/१/१९
शनी अमावस्या

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कांदेपोह ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते

☆ विविधा ☆ कांदेपोह ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते ☆

संध्याकाळची वेळ होती. टेरेवर वनिता फेऱ्या मारत होती. आपण किती चाललो हे पाहण्यासाठी सोबत मोबाईल ही होता. आवडती गाणी ऐकत शांत फिरण्यातील मौज काही औरच होती.तो आनंद घेत असताना मोबाईलची रिंग वाजली. बघते तर भाचीचा होता.ही प्राची पुण्यात जाॅब करते.” हं… बोल प्राचू,काय म्हणतेस?”

“अगं… अतू आज ना… मी मुलगा बघायला गेले होते. त्यांची माझी भेट झाली.”

“तूला कसा वाटला तो? काय करतो? कसा दिसतो? कुठे असतो?”

“अगं किती प्रश्न ते? हे बघ त्याचा फोटो आणि त्यांचे सगळे डिटेल्स मी तुला सेंट केले आहे.  मग मला कळव. तुला कसा वाटला तो? या बाबत तूच माझी गुरू आहेस बरं. बरं फोन ठेवते, मला एक काॅल येतोय रात्री निवांत बोलू,बाय..बाय..आय लव्ह यू.”

फोन कट झाला.

मनात आले. ही पिढी किती प्रक्टिकल आहे. बरोबर चूक हा भाग पुढचा. ही पिढी उगाच गुंतून पडत नाही. त्रास करून घेत नाही.भाऊ माहिती पाठवतो. मग प्राची पुण्यात नोकरी सांभाळत मुलांना बघते. ते ही एका हाॅटेल मध्ये एकटी जाते. बोलते. विचारांची देवाण घेवाण होते.हे सारं किती सुटसुटीत छान आहे. एका क्षणात माझे मन भूतकाळात गेले. आमच्या वेळी पस्तीस, चाळीस वर्षा पूर्वी घरात मुलगी बघायला पाहुणे येणार म्हणजे किती गडबड, किती लोकांची ऊठबस, किती तयारी, किती दमणूक होत असे.

घर स्वच्छ करा, बैठकीची खोली सजवा, ठेवणीतल्या कपबश्या काढा स्वच्छ करून ठेवा, कांद्यापोह्यानची तयारी करा, कांदेपोहे सुधा एकदम स्पेशल. त्यात शेंगदाणे हवेत, बटाटा हवा, खोबरंकोथिंबीर हव, लिंबू,बारीक शेव हवी. किती मिजास असे पोह्यांची. असे गरमागरम पोहे समोर आले की सगळं विसरायला होत असे. एवढ करून ही मुलाला बिधास्त बघता येत नसे. बघण्यांची चोरी. कुठेन तरी लांबून, एखाद्या फटीतून चोरुन बघाच आणि मग अंदाज करत बसायचं यातला नेमका नवरदेव कोण? मुलीला बघताना मुले आपल्या सोबत तीन चार मित्रांना हमखास घेऊन येत, साडी सांभाळत खाली मान घालून बसायचं, चोरट्या नजरेने बघायचं, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना हळू आवाजात उत्तरे द्याची. आपली इच्छा असली तरी मुलाला प्रश्न विचारण्यांची हिंमत नसायची. घरातल्या वडिलधाऱ्या बायकांनी आधी दटावून ठेवलेले असायचे तुझा शहाणपणा तुझ्या जवळ ठेव. तिथं वर तोंड करून काही बोलून आपली अक्कल पाजळू नकोस. खर तर परक्या माणसा समोर जाताना आधी मनात भिती असायची, चारचौघात बोलण्यांची सवय नसायची, मग  काय बऱ्याच वेळा ततपप व्हायच. अश्या वेंधळा मुली लगेच पसंतीला उतयाच्या. पुढे ही मुलगी घरात निमुट वागेल असा अंदाज बांधला जायचा. खर तर बऱ्याच मुलीच्या मनाचा तिथे चोळामोळा होत असे. तिच्या विचारांना फारशी किंमत नसे.ती मिळवती असली तरी ही. घराण्यांची अब्रु जायला नको म्हणून बोलायचे नाही. चांगल्या वळणाची, सुसंस्कृत, शिवणटीपन करणारी, स्वयंपाकपाणी करणारी अशी किती तरी लेबलं चिटकवली जायची. ती मुलगी मात्र मुक. घरच्या पुढे चालत नसे. बऱ्याच वेळा मुलींची फसगत होत असे. दोघांनी भेटून मन समजून घेणे खुप पुढची गोष्ट. पुन्हा एकदा बघण्यांची पध्दत नव्हती, लग्न नंतर समजे तिला आवडलेला मुलगा नेमका मुलाचा मित्र होता. मग काय आलीया भोगाशी असावे सादर. हसतमुख राहून संसार नेटका करावा लागे.

माझ्या बाबतीत तर अजून वेगळे आम्ही पाच भावंडे.दोन बहिणी मोठ्या तर एक छोटी. भाऊ माझ्या पाठीवर.मोठ्या बहिणीना बघायला येणार त्याना त्रास नको म्हणून प्रत्येक वेळी घर आवरण्या पासून पोहे करे पर्यंत सगळं कामे मी करत असे. पोहे इतके बनवले की डोळे बांधून ही आज  बनवेन. पण माझ्या वेळी मात्र घरी कोणीच नव्हते. मीच घर आवरायचे, बैठकीची खोली सजवायचे, पोहे करायचे, साडी नेसून पाटावर बसायचे. किती वेळा पाहुण्याना पत्र व्यवहार ही मीच करे. मी यात एकदम तंज्ञ झाले.

प्राचीमुळे आज इतक्या वर्षांनी आठवणींना उजाळा मिळाला. आज काल अशी झंझटे नाहीत. हाॅटेल मध्ये सगळं तयार असतं, कसली आवरा आवर नाही, सजावट नाही, कांदेपोहे नाहीत, मनावर दडपण नाही, सगळ कस मस्त मोकळं. मुलामुलीना आपलं मत मांडता येते, एकमेकांना जाणून घेता येते. अडचणी मांडता येतात, हे सारं चांगले आहे. याचा पुरस्कार व्हायला हवा. मुलीनां ही एक व्यक्ती म्हणून वागणूक दिली जात आहे दिली गेली पाहिजे. लग्न ठरवताना मुला मुलीचा बाजार होता कामा नये.

आजवर कांदेपोह्यांनी अनेक संसार उभारले, जीवनात आनंद पेरला, आज संकल्पना बदलत आहे. मुलामुलीची बघण्यांची ठिकाण बदलत आहेत. खाण्यांचे पदार्थ बदलत आहेत पण लग्न जुळवण्याचा विषय आला की कांदेपोहे समोर येतातच त्यांचे लग्न जमवण्यात अतूट नाते आहे. आता फेऱ्या मारताना माझ्या समोर हा भूतकाळाचा का उभा राहावा? काही झालं तरी एकमेकांना समजून घेण्यासाठी, नातं दृढय करण्यासाठी काही तरी निमित्त हवं असतं ते निमित्त आजवर समाजाने त्या कांदेपोहे यात शोधले यात त्यांचा काय दोष?

 

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

मो.९६५७४९०८९२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भाई… भाग -1☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ विविधा ☆ भाई… भाग -1☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

भाई, चला आवरलंय माझं. उशीर होईल  नाहीतर खेळाला पोचायला.

आग सुनिता, थांब एवढ  शेवटचं पान लिहितोय, पण कुठला खेळ ?

काय हे भाई, “भाई” सिनेमाचा पहिला शो.

सुनीता अग या हिंदुस्थानात भाईचा सिनेमा फक्त ईदला येतो. मार्गशिर्ष कृष्ण १४ ला अमावस्येच्या पूर्वसंध्येला  येणारा हा कुठला ‘भाई’ ?

भाई, बास झालं हा माझी फिरकी घेणे.  ज्याने आयुष्यात अनेक अमावस्यां सोसून  मराठी सारस्वताच्या दुनियेत ‘पोर्णीमा’ खुलवली त्या भाईचा म्हणजे तू अर्थात “पुरुषोत्तम  लक्ष्मण   देशपांडे” यांच्या वरचा ‘भाई ‘ सिनेमा.

बरं  बरं. त्या उबेराला  विचार राफेल तयार आहे का?

काय?  भाई कालच्या संसदेतील चर्चा  फारच मनावर घेतलीयस तू? त्या रंभेला सांगून  २०१९  लोकसभा होई पर्यत केबल बंद करायला सांगते.

त्या कुबेराला पुष्पक विमान तयार आहे का असं म्हणायचंय का तूला?

हो. हो  तसेच

भाई, त्यांनी आधीच सांगितले आहे  पुष्पक तयार आहे  तुम्हाला मुंबईकर, नागपूरकर का पुणेकर म्हणून जायचंय?

बघ सुनीता, त्या नागपूर मधील  उणे तापमानातील थंडी काही आपल्याला सहन व्हायची नाही,  १२ अंश तापमानाला गिरगावकर, पार्लेकर, डोबिवलीकराना जणू इकडे काश्मीर, महाबळेश्वर अवतरलं असे वाटत असलं तरी तिकडे मराठी सिनेमा कुठे लागला आहे हे हुडकण्यात आपला वेळ जाईल

*तेव्हा आपले पुणेच बरे*

माझ्या मनातलं बोललात भाई

अग  सुनीता तो बघितलास का अंतू बर्वा, ‘ बटाट्याच्या चाळीत ‘  कुठली स्कीम घेऊन गेलाय. ‘असामी असामी’  व ‘अपूर्वाई’ पुस्तक घेतल्यास  ‘भाई’  सिनेमाचे एक तिकीट  मोफत असं ओरडत सुटलाय

अमॅझीग  ना भाई?

नाही सुनीता कलियुगात त्याला ‘अमेझॉन’ का काय म्हणतात ?

घ्या आता  हेच बघायचे राहिले होते मी म्हणतच होतो ‘सखाराम गटनेने’ अजून ‘व्हाट्सअप वर’ चारोळी कशी पाठवली नाही ते. बघ काय म्हणतोय तो :-

हेल्मेट सक्तीने पुण्यात

सगळ्यांना आली ‘फिट’

अन ‘भाई’  ऐन हिवाळ्यात

एकदम होणार ‘हिट’

आपलाच  – सखाराम गटणे

चितळे मास्तरांनी तर आज शाळेच्या मुलांना सहलीला नेतो म्हणून ‘भाई’ दाखवायचं ठरवलं आहे, बरं का सुनीता

भाई  किती प्रेम आहे तुझे तुझ्या या पात्रांवर आणि त्यांचे तुझ्यावर. आता फक्त एवढे सांगू नकोस की ती  रत्नागिरी  – मुबंई बसच्या वाटेत हातखंब्याला आडवी आलेली

“म्हैस”  कोथरूडला सिटीप्राईडचा प्रागंणात रवंथ करत लाडक्या ‘भाईची’ वाट बघतेय आणि  तिने दिलेल्या शेणाच्या  गोण्यांची शेकोटी करून ‘नाथा कामत’, नंदा प्रधान, अण्णा वडगावकर, नामू परीट, गजा खोत, रावसाहेब तिकीटाच्या रांगेत उभे आहेत.

?

अगदी बरोबर सुनीता, आणि तो नारायण  तिकीटाच्या रांगेत स्वतःच्या नावाचा दगड ठेऊन, सगळ्यासाठी पॉपकॉर्न रूपी लाह्या फुटाणे आणायला पळालाय.

किती चेष्टा करशील  सुनीता तू माझी, हे काय वय आहे का? आपण स्वर्गात आलोय आपण आता पुण्यात नाही आहोत. काल रात्री झोपेत काय गाणं बडबडत होतीस माहीत आहे?

‘भाई भाई, व्यक्ती वल्लीचा, कसा सिनेमा घडला, बाई बाई’

नशीब ‘आचार्य अत्रे’ बाजूला ढाराढुर झोपले होते नाहीतर आज काळी पूर्ण गाण्यांसह

‘झेंडूच्या फुलांचा’ हार गळ्यात पडला असता आपल्या

भाई, ते जाऊ दे. चला ना जरा लवकर निघून मस्त  पर्वतीवर जाऊन सारसबागेतील गणपतीचं दर्शन घेऊ.

मी तर म्हणतो सुनीता  एक दिवसाची रजा टाकू स्वर्गात. तू म्हणतीस तसे पर्वतीवर जाऊ, सारसबागेत जाऊन स्वेटर घातलेल्या बाप्पाचे दर्शन घेऊ, सिनेमा बघू, आणि हो  तुझ्या मनातले

तुळशीबागेत संध्याकाळी जाऊ, सर्व देव -गणांसाठी  चितळ्यांची अंबा बर्फी आणि बाकरवडी घेऊ  आणि *सगळ्यात महत्वाचे* रात्री मुक्कामाला डेक्कनला  “मालती – माधव” मधै जाऊन  त्या चोराने पुस्तकाचा घातलेला पसारा आवरु  अन सकाळच्या

आपल्या लाडक्या  ‘दक्खनच्या राणीने’ मुंबई पर्यत जाऊ.

परतीचे  पुष्पक विमान  मुंबई हुन  सोडण्याची विनंती करायला भाई  चित्रगुप्तां कडे गेले. पाठमो-या भाईंकडे पाहताना सुनीता ताईंना त्यांचे गुणगुणे  ऐकू आले

हृदयांबुजी लीन लोभी अली हा !

मकरंद ठेवा लुटण्यासी आला  !

बाधी जीवाला सुखाशा मनी !!

*मर्म बंधातली ठेव ही* !!!

*भाई, खूप खूप शुभेच्छा*

 

©  श्री अमोल अनंत केळकर

३/१/१९

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्वप्न ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ. शशी नाईक-नाडकर्णी

☆ विविधा ☆ स्वप्न ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆ 

स्वप्न हे माणसाला मिळालेलं वरदान आहे. ते जागेपणी बघितलं तर ते एखाद्या चित्रासारखं, रांगोळी सारखं माणूस  त्याला हवं तसं रेखाटू शकतो. त्यांत मनासारखे  रंग भरु शकतो. क्षणभरासाठी का होईना कृतकृत्य  होतो.

एखादी अल्लड तरुणी परीकथेतील राजकुमारला साद घालून स्वप्नात बोलावते. किंवा एखादा जेमतेम सुमार असलेला तरुण त्याच्या  समोर राहणारी सुंदर तरुणी आपली जीवनसाथी झाल्याचे स्वप्न  रेखाटतो.एखादा देवानंद आपल्या प्रेयसी बरोबर संसाराचे स्वप्न रंगवतो. ‘तेरे मेरे सपने अब एक रंग है….

एखादं नवदांपत्य, त्याना नुकतीच बाळाची चाहूल लागते.मग त्यांचा स्वप्नाचा चलत् चित्रपट चालू.आपल्याला मुलगा होणार का मुलगी, मग त्या बाळाचे नाव काय ठेवायचं इथपर्यंत ठीक आहे.मग त्याला/तिला कोण बनवायचे? वडिलांचे एक मत तर आईचे दुसरेच मत.मग त्यावर गोड वादविवाद. मग ती मुलगी झाली तर तिला शिकवायचे,लाडाकोडात वाढवायची आणि दुस-याला द्यायची. ह्या कल्पनेनेच आताच डोळ्यांत पाणी.म्हणजे स्वप्न बघायला आणि ते किती काळापर्यंत त्याला मर्यादा नसते.

“मला ना सिनेमा, नाटकात काम करायची लहानपणापासून खूप इच्छा होती. पण आमचे आजीआजोबा  जुन्या वळणाचे त्याना पटलं नसतं म्हणून माझंअपुरं लिहिलेलं स्वप्न आता मी माझ्या मुलीकरवी पूर्ण करणार”. मग त्या मुलीला त्याची आवड आहे का? तिचा कल तिची,कुवत आहे का? ह्याचा विचार

न करता आईचं स्वप्न पूर्ण मुलीच्या करवी करायच्या अट्टाहासापायी त्या मुलीवर लादायचे. त्या मुलीच्या स्वतःच्य स्वप्नाची राखरांगोळी होते.तिला काही ध्येय रहात नाही.हे लक्षात घ्यायचे नाही.फक्त आपली स्वप्नपूर्ती. अशा कित्येक मुलांना हेच सहन करावं लागतं. मनाविरुद्ध कोणत्याही स्पर्धेत धावावं लागतं केवळ आईवडिलांची स्वप्नपूर्ती. जी ते त्यांच्या वेळी करु शकले नाहीत.एखाद्याचे भाषेवर प्रभुत्व असते.आवड असते. पण आई,वडील डाॅक्टरी पेशात म्हणून त्याला विज्ञान शाखेला जायची सक्ती. मग काय डाॅक्टर तर दूरच पण कम्पौडरच्या पण लायकीचा न रहाता गटांगळ्या खाऊन नैराश्याच्या गर्तेत पडतो.

काही माणसे एखादं स्वप्न बघतात आणि मग ते सत्यात उतरवायला पाठपुरावा करतात.यशस्वी होतात.म्हणून स्वप्न नेहमी मोठी बघावी.आणि ती पूर्ण करण्यासाठी झटावं.हीच यशस्वी जीवनाची किल्ली आहे.

रात्रीची स्वप्न मात्र बेभरवंशाची.कधी आपल्या मर्जीची,कधी मनाविरुद्ध. कधी मनाला पटणारी,हवीहवीशी वाटणारी, संपूच नये कोणी झोपेतून उठवू नये.असं वाटणारी.तर कधी भयानक,कल्पना शक्ती च्या बाहेरची घाबरवणारी. घाम फुटवणारी, जाग आल्यावर ‘चला स्वप्न होते, सुटलो म्हणून आनंदी करणारी.

काही स्वप्न इतकी छानच असतात कि देवाघरी गेलेले आपले आईवडील, किंवा अन्य कोणी परत आपल्याला कधीच भेटू शकत नाही,बोलू  शकत नाही ते स्वप्नात येऊन खूप वेळ आपल्याशी पूर्वीसारख्या च गप्पा मारतात. आताशा व्हिडिओ काॅल करुन दूर अंतरावर  असलेल्या आपल्या मुलाला आईवडील पाहू शकतात बोलू शकतात. पण पूर्वी ही सोय नसल्याने स्वप्नात आलेल्या मुलाला बघून समाधान मानायचे.कधी जागेपणी  आपल्या पसंतीच्या मुलीबरोबर त्याच्या विवाहाचे स्वप्न रंगवायचे.कधी हे स्वप्न पूर्ण ह्वायचे  तर कधी तो परस्पर ठरवून नमस्काराला येऊन ह्यांचे स्वप्नभंग करायचा.

कलियुगात माणूस  आपल्या स्वप्नाचा सोईस्कर नेहमीप्रमाणे  अर्थ लावतो. सोडून देतो.पण त्रेतायुगात स्वप्नात दिलेल्या वचनाला जागण्यासाठी सत्यवादी हरीश्चंद्राने स्वतःच्या, पत्नीच्या, मुलाच्या जिवाचीही पर्वा केली नाही.

आपण सारखा जो विचार करतो त्याचच झोपल्यावर स्वप्न पडते. कधी त्यामुळे  इच्छापूर्ती होते,कधी विरस होतो.

स्वप्न कोणी कसलेही बघावं म्हणजे तो बघू शकतो त्याच्या मर्जीनुसार.त्याला पैसा लागत नाही.स्थळ,काळ,वेळाचं बंधन नसतं.कोण व्यक्ती आपल्या स्वप्नात यावी, कोण नको हे पण स्वातंत्र्य असते.एखादा कंगाल माणूस स्वप्नात स्वर्गात रंभा,उर्वशी बरोबर विहार करतो तर एखादा क्रिकेटवीर गावस्कर, तेंडुलकर बरोबर स्वप्नांत खेळू शकतो.एखाद्या देवभोळ्या माणसाला विठू भेटतो.

! मनी वसे ते स्वप्नी दिसे !

 

© सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माझे फराळ प्रयोग ☆ श्री विनय माधव गोखले

☆  विविधा ☆ माझे फराळ प्रयोग ☆ श्री विनय माधव गोखले ☆ 

यंदा दिवाळीत बायकोला for a change फ़राळ ‘खाण्यासाठी’ नव्हे तर ‘बनवण्यासाठी’ मदत करावी असे ठरवले होते. खार्‍या शंकरपाळ्याला मदत कर असे बायकोने सुचवले. ह्याचे कारण असे सांगण्यात आले की ह्या पदार्थाला शक्ती जास्त आणि कौशल्य कमी लागते. ह्या निकषावर माझी निवड होणे थोडे मानहानिकारक असले तरी त्यामुळे हिरमुसून न जाता अब्राहम लिंकनने एका रस्ता झाडणार्‍या कर्मचार्‍याला सांगितलेले वाक्य मी मनामध्ये स्मरले. लिंकन साहेब त्याला म्हणाले होते की “रस्ता पण असा स्वच्छ कर की पाहणार्‍याने म्हणावे, “वा, रस्ता काय छान झाडलाय!”

उत्साहाने पोळपाट-लाटणे घेऊन अस्मादिक फ़रशीवर ठाण मांडून बसले. मैदा मळून त्याचा गोळा मला सुपूर्द करण्यात आला. पहिल्यांदाच मैदा लाटत असल्याने एक छोटा गोळा बाजूला काढून दोन्ही हाताने मळून चकती करून लाटायला घेतला. कणकेपेक्षा मैद्याला थोडा जास्त जोर लागतोय असे जाणवले. एकदम परफ़ेक्ट गोल लाटून बायकोला चकित करावे असा माझा प्लान होता. त्यामुळे थोडा हलक्या हात वापरत होतो. पण गोल हा एकमेव आकार सोडून इतरच भलतेसलते आकार त्यामधून उदयास येऊ लागले, उदा. अमीबा, पॅरॅमॅशियम, हत्ती, डायनासॉर, भारताचा नकाशा इ.इ. एकदा तर चीनी ड्रॅगन मला वाकुल्या दाखवू लागला. ह्यावर मात्र माझे देशप्रेम उफ़ाळून आले आणि मी ताबडतोब ती पोळी त्वेषाने गोळामोळा करून पुन्हा लाटायला घेतली. पहिली पोळी लाटून बायकोला दाखवल्यावर ती म्हणाली “अरे किती जाड लाटलीस, जास्तीत जास्त पातळ लाट ना!” असे म्हणून थांबली नाही तर तीच पोळी स्वत: ५० टक्क्याने वाढवून दाखवली. “तुला शिकवण्यापेक्षा ना, मीच लाटले तर काम लवकर होईल!” असे कुणीतरी पुटपुटले परंतु हे वाक्य मी ऐकून न ऐकल्यासारखे केले.

नंतर कातण्याने त्यावर पटापट उभ्या-आडव्या रेषा मारायला शिकलो. हे मात्र काम सोपे आणि मजेशीर वाटले. पण इथे उलटी समज मिळाली की हलक्या हाताने कातण फ़िरवावे म्हणजे पोळपाटापासून विलग करायला त्रास पडत नाही. बायकोने मी काढून दिलेले शंकरपाळे तळायला घेतले. आसमंतात छान सुवास दरवळायला लागला. सुरवातीच्या चुकांनंतर जरा वेग पकडता आला आणि साधारण दीड तासानंतर सर्व शंकरपाळे तयार झाले.

दिवाळीत पाहुण्यांना फ़राळ देताना बायकोने माझ्या नावाचा कवतिकाने उल्लेख केल्यामुळे अस्मादिक धन्य-धन्य जाहले!!?

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वर्क फ्रॉम होम ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

☆ विविधा ☆  वर्क फ्रॉम होम ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆

वर्क फ्रॉम होम, ही कनसेप्ट आता साऱ्या जगभर दुमदुमते आहे. या बाबतीत कुणाला काही माहिती नाही असे नाही किंबहुना त्याचे महत्व ही आता सगळ्यांना पटायला लागले आहे. अर्थात हे काम इंजिनियर्स, टिचर्स. ऑफीस  वर्कर्स यांच्याच साठी अॅप्लिकेबल आहे असेच मानले जाते.

पण खरं सांगू का? शतको न शतके आपल्या संर्वांच्या घरातील महिला, गृहिणी वर्क फ्रॉम होम करतच आल्या आहेत. पण त्यांच्या कामाची, कष्टाची कोणीही दखल घेतली नाही. अन् घेतली जाणार ही नाही. घरीच असते म्हणजे घरातील कामे तिचीच असेच गृहीत धरले जाते. ती कामे करताना ती किती दमून जाते याचा कोणी विचारच करत नाही. ऑफीसचे काम घरामधून केले की निदान त्याचा रिटर्न पगाराच्या रुपामध्ये मिळतो. बँक बॅलेन्स वाढत जातो. एक प्रकारे मानसिक शांतता ‘ ऊ ब, समाधान नकीच मिळते. मात्र गृहिणी ना तेवढा आधारही नाही. पगार वाढ करा म्हणून संप करू शकत नाहीत की हौसेनं एखादी वस्तू मनात आले म्हणून घेऊ शकत नाही.

काही वर्षापूर्वी मलेशियाला जाण्याचा, तिथे रहाण्याचा मला योग आला होता. तेव्हा तिथल्या मित्रांना यांनी घरी जेवायला बोलावले होते. आपल्या पद्धती प्रमाणे मी जेवण वाढत होते. साधे मीठ वाढले, भांड्यात प्यायला पाणी घातले तरी ते प्रत्येक वेळी ‘ थँक्यू ‘ म्हणत होते. पहिल्यांदा ते थँक्यू ऐकून माझे मन भरून आले. डोळ्यात पाणी जमायचेच बाकी राहिले होते. मला आपल्या सगळ्यांच्या घरातल्या आई, आजी काकू, मावशी, आत्या सगळ्या सगळ्या आठवल्या. आयुष्यभर संसाराचा रामरगाडा ओढला तरी एकदाही तिला ऐकायला मिळाला नसेल ‘ धन्यवाद’ शब्द !

अर्थात आपल्या कडे तशी अपेक्षा नाही आणि प्रथा तर नाहीच नाही. पण घरातल्या कोणीतरी मनापासून दखल जरी घेतली तरी तिला आणखीनच काय करण्याचा उत्साह येतो. पण गृहीत धरणे हे आपल्या कडे रुटीन असल्यामुळे तिकडे कोणाचे लक्ष्य जात नाही.

असे दुर्लक्ष्य फक्त महिलांचे होते असेही नाही. पूर्वी एकत्र कुटुंब काळामध्ये मोठ्या व्यक्तिचा घरावर दरारा असायचा, दबदबा असायचा. त्याचाच लहान भाऊ किती जरी कर्तबगार असला, तरी त्याचे एका शब्दानेही कौतुक होत नसे. त्याची दखलही घेतली जायची नाही. हे कुणाच्या लक्षातही यायचे नाही.

आजच्या वर्क फ्रॉम होम मुळे निदान सर्वांना गृहिणीचे अस्तित्व, कर्तृत्व अन् महत्व समजायला लागले आहे असे आपण आनंदाने मानूया.

© सौ.अंजली दिलिप गोखले

मो  8482939011

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares