मराठी साहित्य – विविधा ☆ – युरेका, युरेका ! – ☆ सुश्री अश्विनी अभ्यंकर ☆

सुश्री अश्विनी अभ्यंकर

?  विविधा ?

☆ – युरेका, युरेका ! – ☆ सुश्री अश्विनी अभ्यंकर ☆

बरेच जण जमले होते. काही चुकचुकले, काही हळहळले. काही भावनावेगाने कोलमडले. काहींनी सांत्वन केले. काहींनी दिलासा दिला. काहींनी बजावले ‘जीव घुटमळेल’. सरते शेवटी आत्म्याच्या सद्गतीसाठी प्रार्थना करून सर्व पांगले.

‘जीव घुटमळेल’? खरंच? स्वतःच्या निष्प्राण पिंजऱ्याकडे पाहताना काय वाटत असेल त्याला? किंवा काहीच वाटत नसेल!

… तरीपण, एक चर्चाच करायची ठरवली तर? मागे सुटलेल्यांसाठी ओढ वाटत असेल का त्याला? का दुभंगलेल्या संबंधातून मिळालेल्या सुटकेमुळे, सुटकेचा निश्वास? आजूबाजूला पाहता जास्त करून निःश्वासंच सुटत असतील, असं वाटतं. अर्धवट राहिलेली स्वप्नं, परिस्थितीची घुसमट, लादलेली नाती, अपयश, केलेल्या चुका, आणि बरंच काही.

पाप-पुण्याच्या सिद्धांतानुसार गणित मांडायची भीती वाटत असेल का? तर मग काही नक्कीच बिचकत असतील. इथली मोह-माया आटोक्यातली वाटू शकते. पलीकडचं तर सगळंच अपरिचित. अज्ञाताची भीती. मग त्या वेळी आपल्या जुन्या आवरणाचा लोभ वाटू शकतो.

आता जरा मागे उरलेल्यांकडे पाहूया. जसा गेलेल्याला अज्ञाताचा प्रवास, त्याचप्रमाणे मागे राहिलेल्यांसाठी काही कमी खडतर प्रवास नसतो. सोडून गेलेल्याशिवायचं आयुष्य आता प्रत्येकाचं वेगळं. नवे पाश, नवीन समीकरणं. काहींचा आधार सुटतो तर काहींची सुटका होते. म्हणजे जाणारा सुटतो का रहाणारा? अजून एक वेगळा प्रकार पण असू शकतो. या दोघांपेक्षा वेगळा. म्हणजे इथे असताना सर्वसाधारणपणे आनंदात जगलेला. छान नातेसंबंध जपलेला, यश उपभोगलेला, सुखाने आयुष्य व्यतीत केलेला. त्याला काय वाटेल? इथला सुखाचा प्रवास संपला म्हणून मागे बघून घुटमळला असेल? का आणखी आनंदाच्या उत्सुकतेपोटी पुढे पाहिलं असेल? आनंदाने निरोप घेतला असेल का? का इथल्या प्रेमाची कास सोडवत नसेल? अडखळेल का तो? 

… गंमतच आहे ही. म्हणजे एकाला तिथल्या अंधाराची भीती वाटू शकते आणि त्याचवेळी, दुसऱ्याला तिथल्या सुखाची गरज नसते.

आता पुढचा प्रश्न. ही चर्चा तर संपतच नाहीये! तर प्रश्न असा की, आपण यात कुठल्या प्रकारात मोडतो? ते कळणार कसं? कारण स्वतःलाच फसवायची चांगली कला अवगत झालेली आहे आपल्याला. ‘होत्या’च्या आणि ‘नव्हत्या’च्या त्या उंबरठ्याशी गेल्याशिवाय काही आपल्याला कळायचं नाही. पण, नंतर कळून तरी काय उपयोग? कोणाला सांगणार … ‘युरेका! मला कळलं’…. म्हणजे तिथेसुद्धा ‘स्व’चा शोध काही संपतच नाही म्हणायचा.

बरं. आता इतक्या विवेचनानंतर आणखी एक कल्पना. आता ही शेवटची! हे सगळं – आत्मा, जीव, त्यांचे पाश, मोह, इच्छा-आकांक्षा, या सगळ्यांचा परस्पर संबंध असं काही नसेलच तर? म्हणजे … 

… ‘ युरेका ’ पण आपल्या नशिबात नसेल तर? 

 © सुश्री अश्विनी अभ्यंकर

(ता. क. : हा निव्वळ कल्पनाविलास आहे. कुठल्याही प्रकारचा तत्त्वज्ञानाचा उहापोह वगैरे नाही.)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग २५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग २५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- महाबळेश्वरला फॅमिली शिफ्ट करेपर्यंतचा साधारण एक वर्षाचा काळ आम्हा उभयतांच्या दृष्टीने खरंच कसोटी पहाणारा होता. माझ्यापेक्षाही जास्त माझ्या बायकोसाठी. रोजचं कॉलेज, प्रॅक्टिकल्स, अभ्यास या सगळ्याचं श्वास घ्यायलाही फुरसत नसणारं ओझं आणि शिवाय लहान मुलाची जबाबदारी! आमच्या मुलाचा, सलिलचा जन्म झाल्यानंतर तशीच परिस्थिती निर्माण झाली तेव्हा बालसंगोपनाला प्राधान्य देत कर्तव्यभावनेने तिने तिची राष्ट्रीयकृत बँकेतली नोकरी सोडली होती. तिला शैक्षणिक क्षेत्राची आवड होती आणि सलिल थोडा सुटवांगा झाला की त्यादृष्टीने प्रयत्न करण्याचे तिने ठरवले होते. त्यानुसार यावर्षी तिला सरकारी बीएड कॉलेजमधे ऍडमिशनही मिळाली होती. आणि या पार्श्वभूमीवरची माझी महाबळेश्वरला झालेली बदली! 

या सगळ्याचा आत्ता पुन्हा संदर्भ आला तो तिच्या करिअरला आणि आमच्या संसारालाही विलक्षण कलाटणी देणाऱ्या आणि त्यासाठी माझी महाबळेश्वरला झालेली बदलीच आश्चर्यकारकरित्या निमित्त ठरलेल्या, सुखद असा चमत्कारच वाटावा अशा एका घटनेमुळे)

त्याकाळी इंग्रजी हा मुख्य विषय घेऊन एम. ए. बी एड् झाल्यानंतर कोल्हापूरमधे शाळाच नव्हे तर कॉलेजमधेही सहज जॉब उपलब्ध होऊ शके. पण तिने पुढे काय करायचे याचा विचार त्या क्षणी तरी आमच्या मनात नव्हताच. त्यातच माझी महाबळेश्वरला बदली झाल्यामुळे एप्रिलमध्ये तिची परीक्षा संपताच कोल्हापूर सोडायचे हे गृहितच होते. कौटुंबिक स्वास्थ्य आणि मुलाचे संगोपन यालाच सुदैवाने तिचेही प्राधान्य होतेच. तरीही जिद्दीने एवढे शिकून आणि इच्छा असूनही तिला आवडीचे कांही करता आले नाही तर तिच्याइतकीच माझ्याही मनात रुखरुख रहाणार होतीच. पण ते स्विकारुन पुढे जायचे याशिवाय दुसरा पर्याय होताच कुठे? 

या पार्श्वभूमीवर भोवतालचा मिट्ट काळोख अचानक आलेल्या लख्ख प्रकाशझोताने उजळून निघावा अशी एक अनपेक्षित घटना घडली आणि आरतीच्या करिअरला आणि अर्थातच आमच्या संसाराला ध्यानीमनी नसताना अचानक प्रकाशवाटेकडे नेणारी दिशा मिळाली! हे सगळंच अनपेक्षित नव्हे तर अकल्पितच होतं. त्या क्षणापुरता कां होईना चमत्कार वाटावा असंच!

कोल्हापूर सोडून आम्ही सर्व घरसामान महाबळेश्वरला हलवलं. बी. एड्. चा रिझल्ट लागायला अजून कांही दिवस असूनही महाबळेश्वरला आरतीला हवी तशी एखादी चांगली नोकरी मिळण्याच्या कणभर शक्यतेचा विचार मनात आणणंही एरवी हास्यास्पदच ठरलं असतं, अशा परिस्थितीत महाबळेश्वरच्या घरी आल्यानंतरच्या चारपाच दिवसात लगेचच इंग्रजी विषयाची शिक्षिका म्हणून महाबळेश्वरच्या सरकारमान्य माध्यमिक शाळेत आरती कायमस्वरुपी रुजूही झाली!!

हा आमच्यासाठी अनपेक्षित असा सुखद धक्काच होता! यामागचा कार्यकारणभाव समजून घेतला तर ही घटनाच नव्हे तर त्या घटीतामागचं परमेश्वरी नियोजन त्याक्षणापुरतं तरी चमत्कारच वाटत राहिलं. ‘देता घेशील किती दोन कराने’ या शब्दांमधे लपलेल्या चमत्कृतीची ती प्रचिती खरंच थक्क व्हावं अशीच होती!

महाबळेश्वरस्थित ‘गिरिस्थान हायस्कूल’ आणि ‘माखरिया हायस्कूल’ या दोन्ही माध्यमिक शाळांकडून आरतीसाठी इंग्रजी शिक्षक म्हणून नवीन नोकरीच्या संधीची दारं अनपेक्षितपणे उघडली जाणं हेच मला अविश्वसनीय वाटलं होतं. बी एड् चा निकालही लागलेला नसताना, आरतीने अर्ज करणं सोडाच तिथे अशी एखादी व्हेकन्सी असल्याची पुसटशीही कल्पना नसतानाही या शाळांकडून परस्पर असाकांही प्रस्ताव येणं हे एरवीही कल्पनेच्या पलीकडचंच होतं.

या दोन्ही शाळांची मुख्य खाती स्टेट बँकेत असल्याने माझा बँक-मॅनेजर म्हणूनही त्या शाळांशी त्या अल्पकाळात ओझरताही संपर्क आलेला नव्हता. दोन्ही शाळांमधे बी. ए बी. एड् इंग्रजी शिक्षकाची एकेक जागा व्हेकेट होती आणि त्यासाठी दिलेल्या जाहिरातींना नवीन शालेय वर्ष सुरू व्हायची वेळ येऊनही कांहीच प्रतिसाद आलेला नव्हता. गिरिस्थान हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी त्यांना मिळालेल्या माहितीची शहानिशा करुन आमच्याशी संपर्क साधला आणि नोकरीसाठी लगेच अर्ज करायला सांगितलं. ही चर्चा सुरू असतानाच त्यांनी ‘व्हेकन्सी बी. ए बी. एड्’ ची असल्याने त्या एम. ए. बी एड असल्या तरी स्केल मात्र मी बी. ए. बी. एड्चंच मिळेल याची पूर्वकल्पनाही दिली. अर्थात आमच्या दृष्टीने त्याक्षणी तरी तो महत्त्वाचा मुद्दा नव्हताच. आश्चर्य म्हणजे तिथे अर्ज करण्यापूर्वीच ‘माखरिया हायस्कूल’चे मुख्याध्यापक श्री. तोडकरसर यांनी आमच्याशी त्वरीत संपर्क साधून ‘एम. ए बी. एड्’ चं स्केल द्यायची तयारी दाखवली व तसा अर्जही घेतला आणि दुसऱ्या दिवसापासूनच नोकरीवर हजर व्हायची विनंती केली. अर्थात बी. एड्चा रिझल्ट लागेपर्यंत मस्टरवर सही न करता मुलांना त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून मोफत शिकवण्याची त्यांची विनंती होती!

त्यांचं एकंदर मोकळं, प्रामाणिक, स्पष्ट न् आत्मविश्वासपूर्ण बोलणं आणि स्थानिक जनमानसात त्यांना असलेला आदर याचा विचार करून आम्ही त्यांचा प्रस्ताव मनापासून स्वीकारला आणि महाबळेश्वरला आल्यानंतर लगेचच आरतीचं माझ्याइतकंच बिझी शेड्यूल सुरुही झालं!

या सगळ्याच घडामोडींना स्वतः साक्षी असूनही मला हे सगळं स्वप्नवतच वाटत राहिलं होतं! 

पुढे पंधरा दिवसांनी जेव्हा बी. एड्चा रिझल्ट आला तेव्हा फर्स्ट-क्लास मिळाल्याच्या आनंदापेक्षाही इतक्या अकल्पितपणे शैक्षणिक क्षेत्रात कायमस्वरुपी कार्यरत रहायला मिळणार असल्याचा आनंद आरतीसाठी खूप मोठ्ठा होता!!

महाबळेश्वरला बदली झाल्याची आॅर्डर माझ्या हातात आली होती तो दिवस आणि मनाला कृतार्थतेचा स्पर्श झालेला हा दिवस या दोन दिवसांदरम्यानचा प्रत्येक क्षण न् क्षण पुन्हा जिवंत झाला माझ्या मनात! त्या त्या वेळचे कसोटी पहाणारे क्षण, वेळोवेळी तात्पुरता फायदा पाहून किंवा नाईलाजाने नव्हे तर अंत:प्रेरणेने आम्ही घेतलेले निर्णय, क्षणकाळापुरती कां असेना पण अनेकदा अनिश्चिततेपोटी मनात निर्माण झालेली अस्वस्थता,.. आणि नंतर ‘त्या’चा विचार मनात येताच मन भरुन राहिलेली निश्चिंतता सग्गळं सग्गळं याक्षणी मनात जिवंत झालं पुन्हा. या सगळ्याच घटीतांच्या रुपात प्रत्येकवेळी ‘मी आहे’ हा ‘तो’ देत असलेला दिलासा मला आश्वस्त करीत होता..!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ – कुठे चाललोय आपण?– ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

सौ. अलका ओमप्रकाश माळी

?  विविधा ?

☆ – कुठे चाललोय आपण? – ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

कुठे चाललोय आपण? काय साध्य करायचंय? विनाशाची सुरुवात तर नसेल ना ही? कलियुग कलियुग म्हणतात ते हेच का? गेल्या आठवड्या भरापासून ज्या बातम्या येतायत त्या वाचून ऐकून मन सुन्न होऊन गेलंय.. रात्रीची झोप उडालीय… घरात लाडो ला वावरताना बघून अजून काळजी वाढतीय… प्रेगन्सी मध्ये अगदी नवस केल्यासारखं मुलगी मागितली होती आज मात्र भीती वाटतीय.. ज्या समाजात स्त्रियांना देवी समजून पूजा केली जाते तिथेच स्त्रियांची होणारी अमानुष, पाशवी, वासनांध विकृतीने किळसवाणी हत्या पाहुन अंगावर शहारा येतोय.. गेल्या आठवड्यात कोलकत्यात घडलेली घटना अजून जिवंत असताना कालच्या बदलापूर येथील घटनेने बधीर व्हायला झालंय… एका मुलीची आई होण किती कठीण आहे ह्याची जाणीव व्हायला लागलीय.. काल बदलापूर घटनेने आतून हादरून गेलीय.. साडेतीन वर्षांची ती बाळी, ती लाडो न पाहता सुद्धा डोळ्यासमोर येतेय.. एक ओळखीचा चेहरा घेऊन…कोणती विकृती आहे ही? वासनांध विकृती पाहून मनाचा थरकाप होतोय… प्रत्येक वेळी मुलींना संस्काराचे धडे देणारा समाज मुलगा वंशाचा दिवा काजळत चालला आहे ह्याकडे लक्ष देत नाहीय का? मुलीनी अमुक कपडे घातले, उत्तान, सेक्सी वाटणारे कपडे घातले, लली लिपस्टिक लावली मग अस होणारच ना ही असली मल्लिनाथी करणारी मंडळी आता कुठल्या बिळात जाऊन बसलीयेत.. शाळेत जाणारी ती चिमुकली युनिफॉर्म मध्ये होती ओ… ना प्रक्षोभक कपडे होते ना सेक्सि हिंट देत होती.. तरीही तिच्यावर अत्याचार झाले एक कळी फुलण्या आधीच कुस्करली गेली पुन्हा एकदा राक्षसी वासनांध मनोवृत्तीची शिकार झाली.. आता ह्यात दोष कोणाचा? दोष फक्त इतकाच तिच्या स्त्री असण्याचा.. तीस बत्तीस तासाची ड्युटी करून थकलेल्या डॉक्टर मुलीवर तिच्याच सोबत काम करणाऱ्या नराधमाने अमानुष बलात्कार केला ज्यातक तिच्या शरीरावर ११४ चावे होते, तिच्या डोळ्यात काचा खुपसल्या गेल्या आणि अजून जे किळसावाणे प्रकार झाले ते तर लिहण्याची ही हिम्मत होत नाहीय माझी.. आणि हे सगळं होत असताना ह्यात स्त्रियांचा ही समावेश होता हे वाचून तर तळ पायाची आग मस्तकात गेलीय… 

कानावर येणाऱ्या हया अशा अनेक घटना पाहून आणि आपल्या ही घरी एक लाडो वाढते आहे हे पाहून मन सुन्न होतंय.. मुलींना फक्त गुड टच बॅड टच समजावून तिच्यावर संस्काराचे ओझे लादून हा प्रश्न सुटेल अस मुळीच वाटतं नाहीय.. साडेतीन वर्षाचे ते लेकरू काय प्रतिकार करणार ओ.. वासनांध झालेल्या राक्षसापुढे तिचा काय निभाव लागणार ओ.. नुसत्या कल्पनेने ही अंगावर शहारा येतोय.. आता काही दिवस हया सगळ्याची खूप चर्चा होईल, मोर्चे निघतील, निषेध होतील, कँडल मार्च निघेल आणि पुन्हा काही दिवसांनी अशाच बातम्या कानावर येतच राहतील.. जोपर्यंत स्त्री आहे तोपर्यंत हे असंच होत राहणार… कोर्टात केसेस वाढत राहणार एकेक अपराधी जेल मध्ये मजेत तीनवेळा मिळणारं फुकटच अन्न खात मजेत जगणारं आणि इकडे जिच्यावर अत्याचार झाला ती झोपेत ही दचकून उठणार तिच्या मनावर आयुष्यभरासाठी असंख्य ओरखडे उठणारं.. आपली न्याय व्यवस्था अशीच हतबल होत राहणार.. आणि तुम्ही आम्ही हे उघड्या डोळ्यांनी पाहत राहणार..

ही सगळी परिस्थिती पाहून मन खचून जातंय.. स्त्रिया कुठेच सुरक्षित नाहीत हे सतत त्रासदायक होतेय.. घरट्यात असूदे, शाळेत असुदे, ट्रेन, बस, रस्ता, ऑफिस कुठे ही जा ही वखवखलेली नजर स्त्रियांचा पाठलाग करतच राहणार.. हया परिस्थितीवर आपण फक्त आणि फक्त उद्विग्न होऊन निषेध करत राहणार का? आपल्या लाडोला कसे वाढवणार आपण.. तीन चार वर्षाच्या मुलीना पेपर स्प्रे आणि कराटे क्लासेस वाचवू शकतात का? ही सगळी परिस्थिती पाहून अस्वथपणा वाढत जातोय मन सुन्न होतेय हे कसे बदलणार की आपण फक्त मुलीनी घातलेल्या कपड्यावर चर्चा करत राहणार.. छे हया अनेक प्रश्नांची उत्तर माझ्याकडे तर नाहीत तुम्हाला सुचत असतील तर सांगा मला ही कारण मी ही एक स्त्री आहे आणि एका लाडोची आई ही… 😭

© सौ. अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माझा श्रावण.. ! ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

?  विविधा ?

माझा श्रावण.. ! ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) 

आषाढातल्या ‘नभ मेघांनी आक्रमिले ‘ झालं की, श्रावणातलं देखणं रूप घेऊन पाऊस येतो त्याच्या म्हणजे श्रावणांच्या स्वागताची दिव्याच्या अमावस्येला दीप पूजनाने सुरुवात होते अन आषाढाची सांगताही सगळ्यां घराला प्रकाशमान करून मनंही प्रकाशमान झालेलं असतं या प्रकाशातच वाळ्यांचा रुणुझुणु नाद करीत श्रावण नाचत, लाजत, बागडत, असा प्रथम आपल्या मनात घरात रिमझिमत येतो श्रावणंधारांनी!… मनं प्रसन्न होऊन जात. जाई जुईचे झेले सुवासाने दरवळतात आणि तसा तो एकटा येत नाही तर, प्रत्येक दिवसाचे धार्मिक अधिष्ठान असलेल्या सणावारांची संगत -पंगत घेऊन या ढगाळ ओल्या दिवसांना उत्साहाची रंगत देत असतो. मग सुरू होतो ऊन -पावसाचा खेळ लप्पा छप्पीच ती जणू ! 

 — हळदुल्या उन्हाच्या या 

पावसात येरझारा |..

 ऊन पावसाचा खेळ 

असा श्रावण साजरा |..

या खेळातच आजही मंगळागौरीचे रंगलेले खेळ, दारातल्या निंबोणीला टांगलेल्या दोरखंडाच्या झोक्यांवर मैत्रिणींबरोबर घेतलेले झोके – मनाचा झुला उंच उंच नेतात. नागपंचमीला माईच्या म्हणजे आईच्या हातची, गरम-गरम पुरणाची दिंडी, वर घरी कढवलेल्या तुपाची धार, जेवताना आम्ही भावंडांनी लावलेली जास्तीत जास्त दिंडी खाण्याची लावलेली पैज, मेहंदीने रंगलेले हात, मोरपंखी रंगाच्या सोनेरी वरखाच्या बांगड्यांची किणकिण, नवकोर जरीच परकर पोलक, अन् नंतर साडी, हाताने बनवलेले गोविंद विडे, रात्री जागून माई बरोबर केलेल्या केवड्याच्या वेण्यां केसात माळल्यावर घरभर पसरलेला केवड्याचा सुगंधी दरवळ, नागपंचमीचे गाणे म्हणत धरलेला फेर, फुगडी, झिम्मा असे मनसोक्त खेळलेले खेळ ! 

माझ्या माहेरी वालचंदनगरला फार मोठी बाग म्हणजे फुलझाडे दारात लावलेली नव्हती. रंगीबेरंगी तेरडा, आघाडा, दुर्वा, गणेश वेल, जाई ही मात्र श्रावणांत असायची. निळ्या, पांढऱ्या गोकर्णाचे वेल, प्राजक्त अंगणात होता. श्रावणी सोमवारी श्री महादेवाला लक्ष-फुले वाहण्यासाठी मग लवकर उठून फुलं वेचायची आणि सगळ्या भावंडांनी आपापल्या भांड्यातला फुलांचा वाटा मोजून माईला द्यायचा. मग बाकीच्या फुलांचे हार, गजरे करायचे. थोडी फुले शेजारी द्यायची आणि त्यांच्याकडून कर्दळीची, सोनचाफ्याची फुलं आणायची. श्रावणांत उपवासाची पण एक मालिकाच असते. सोमवारचा शंकराचा, शुक्रवारचा जिवतीचा उपवास आम्ही माईबरोबर सगळेच करायचो. दादांबरोबर शनिवार आणि गुरुवार. ! हे उपास तसे आमचे जेवण करून फक्त खिचडी, भगर, शेंगादाण्याची आमटी आवडते म्हणून खाण्यासाठीच बरेच वेळा असायचे. वालचंदनगरला गोकुळाष्टमीला देवळात श्रीकृष्ण जन्म साजरा व्हायचा. भजन, कीर्तन, प्रसाद असायचा. तसं तर श्रावणात रोज कुठल्या ना कुठल्या गल्लीमध्ये भजन कीर्तन असायचं. पहायला ऐकायला आम्हाला आवडायचं. देवळाच्या प्रांगणात दहीहंडी व्हायची.

सकाळी सकाळी पत्री गोळा करून आणताना मैत्रिणींचा ग्रुप असायचा. शाळेत जाण्यापूर्वी हे एक महत्त्वाचं काम असायचं. नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा, असे एकामागून एक येणारे सण खाण्याची अन् श्रावणांची रंगत वाढवायचे.

– डोंगरावर वसलेलं शिखर शिंगणापूर हे माझं माहेरचं मूळगाव. तेथील महादेवाचं मंदिर प्रसिद्ध आहे. माझी आत्या शिंगणापूरला असायची. एकदा नागपंचमीला मी तिथे होते. डोंगर माळावर असंख्य वारुळे आहेत. तिथे पूजेला घरातील स्त्रिया व मैत्रिणींबरोबर मी गेले होते. नागचौकिला म्हणजे नागोबाच्या उपवासाच्या दिवशी तिथे गिरीला जाण्याची पद्धत आहे. म्हणजे-महादेवाच्या डोंगराला सबंध प्रदक्षिणा घालून कडे कपारीत असलेल्या शिवपार्वतीच्या पिंडींच- शाळुंकांचं दर्शन घेतलं होतं.. तिथून निघालेल्या झऱ्यासारख्या झुळूझुळू वाहणाऱ्या भागीरथीचं दर्शन घेतलं होतं. तिथेच बसून फराळ केला होता. उपवासाच्या फराळाची ती अंगतपंगत मस्त जमली होती.

या गिरी भ्रमणाचा रस्ता म्हणजे एक खडतर मार्ग आहे. तरी बरोबरीच्या मैत्रिणी, काही बायका, मुले यांच्यामुळे, शंकर पार्वती, राम सीता यांची गाणी म्हणत पायाखालची डोंगरवाट ऊनं उताराला लागल्यावर संपली. पाय दुखतात हे जाणवलेच नाही. श्रावणांतला तो एक खूप सुंदर दिवस किंवा योग पुन्हा आला नाही याचे मात्र वाईट वाटते. अन् – – आता तर तो दिवस स्वप्नवत वाटतो. नातवंडांना सांगायला ही छानशी गोष्ट आहे एवढंच !

असा – – आठवांच्या शिंपल्यात..

 झुले माहेरचा झुला..

 त्या आनंद क्षणांचा..

 असे श्रावणं आगळा||

श्रावण म्हटलं की श्री सत्यनारायण पूजा, फुले, पत्री, दूर्वा, बेल अन् सुगंधी केवड्याशी नकळत छानसे बंध जुळून गेलेले आहेत. आज कुंडीतली थोडीशी फुले असली तरी फुलपुडा पत्री घेताना आठवते, लग्नानंतर दौंडला आमच्या रेल्वे कॉर्टरच्या प्रशस्त अंगणात आम्ही दोघांनी दारासमोर फुलवलेली बाग ! 

जाई, जुई, कृष्ण कमळाचे वेल विविध रंगी तेरडा आणि विविध रंगांची गंधांची फुलंझाडे ही सगळी हिरवाई श्रावणांत अगदी फुलून यायची. मग मंगळागौर, सत्यनारायण पूजेला दोन ओंजळी भरून फुलं, पत्री कर्दळीचे खुंट, शेजारीपाजारी देताना एक आगळाच आनंद असायचा. दारी फुललेल्या फुलांचे भरगच्च गजरे, लांब सडक केसांच्या दोन वेण्यांवर माळून, फुलराणीच्या दिमाखात मिरवणारे आमची सोनुली लेक.. !

असा माझ्या मनातला श्रावण पिंगा घालू लागला की, आठवांच्या सरीवर सरी डोळ्यांतल्या श्रावणसरीं बरोबर गालांवर रिमझिमतात.

 -गावाकडचा रानातला श्रावण तर खूप विलोभनीय. सोनेरी किरणांनी चमचमणारी हिरवाई, पावसाच्या सरींची नादबद्ध रिमझिम, निसर्गाने आभाळभर कोरलेलं इंद्रधनुष्य, आनंदाने कलकलाट करत येणारी सूर्याची किरणे, पाऊस अंगावर घेत स्वैरपणे उडणारी पाखरं …. ही सगळी अपूर्वाई रम्य काव्यमयच. ! दिवसभर रानात कष्ट करून दमलेल्या बायका रात्रीच्या वेळी नागोबाची, राम सीतेची गाणी म्हणून खूप छान फेर धरतात, उखाणे घेतात. ते पाहताना ऐकताना व अनुभवतांना मला आमच्या गावचा निसर्गाच्या सान्निध्यातला श्रावणही मनाला खूप आनंद देऊन जायचा.

आपलं वयं वाढत जातं तसं पावसात भिजणं आपण कमी करतो. तरी श्रावणातल्या रेशीमधारात, एक तरी गिरकी घ्यावी… वयाबरोबर आपल्या वाढलेल्या मनाला पुन्हा टवटवीत करण्यासाठी… जगण्यातला आनंद पुन्हा पुन्हा घेण्यासाठी…

अशा माझ्या श्रावणांत…

 चाफा सुगंध उधळे..

 मोर फुलवी पिसारा 

 ओल्या श्रावणाचा झुले 

 माझ्या मनी फुलोरा.. ! 

©  शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ निर्मळ उदकाचं तळं… सुवर्णाची कमळं… ☆ सुश्री सुलभा तेरणीकर ☆

सुश्री सुलभा तेरणीकर

🔅 विविधा 🔅

☆ निर्मळ उदकाचं तळं… सुवर्णाची कमळं… ☆ सुश्री सुलभा तेरणीकर 

शहरातल्या मुलींचा पंचमीचा सण फांद्यांवर बांधलेल्या हिंदोळ्याविना सुना-सुना जातो, तसा आमचाही गेला खरा; पण ती उणीव भरून निघाली श्रावणातल्या श्रवणीय कहाण्यांनी, श्रावणातल्या एकेक दिवसाला संस्मरणीय करण्याच्या घरातल्या श्रध्दामय संस्कृतीनं, स्वरातल्या हृदय कारुण्यानं !

‘पहिल्या आदितवारी मौनानं उठावं, सचैल स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं, नागवेलीच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी… ‘

आजीनं कहाणी वाचायला बसवल्यानंतर मी ती एका सपाट्यात वाचून काढत असे; पण त्यातलं काही समजत नसे. मात्र, पुढे ऐकताना व स्वतः वाचताना त्या आवडू लागल्या. त्या सर्व कळेपर्यंत श्रावण संपून जाई; मग पुन्हा पुढच्या वर्षी श्रावणाच्या कहाण्यांना सुरुवात होई.

दिव्याच्या अवसेच्या कहाणीतले दिवे अदृश्यपणे झाडांवर येऊन बसत. एकमेकांत बोलत. शुक्रवारच्या कहाणीतली बहीण दागिन्यांना जेवू घालत असे. पाटमधावराणी, चिमादेवीरांणी, सोमा परटीण, गरिबांना मदत करणारे शंकर-पार्वती जवळचे वाटत. घावनघाटल्याचा, खीर-पोळीचा, लाडवांचा नैवेद्य… साठा उत्तरांची कहाणी सुफळ संपूर्ण करण्याचं आश्वासन, हे सर्व फार आवडे. कहाणी ऐकणं, सांगणं, त्यातली उत्कंठा, चित्रमयता, ओघवत्या भाषेचा डौल, लय, छोट्या तात्पर्यातलं जीवनसूत्र… माझ्या गोष्टीवेल्हाळ मनाला रिझवून जात असे. कहाणी संपल्यावर हुरहूर वाटे.

आता तर कहाण्या सरल्या. त्याबद्दल वाटणारं सुनेपणही उरलं नाही. खूप खोलवर हृदयात मात्र कहाण्यांचे शब्द नांदतात. निर्मळ उदकाचं तळ, सुवर्णाची कमळं कधीतरी थरथरतात. त्यांना कहाणी सांगून मीच जोजवलं आहे. नागचवथीनंतर पंचमी, शिळा सप्तमी, नारळी पौर्णिमा, जन्माष्टमी, श्रावणी सोमवार, जिवतीचे शुक्रवार… श्रावणातले एकेक दिवस भराभर येत आणि जात; पण घरातल्या माहेरवाशिणींच्या, नव्या सुनांच्या पहिल्या मंगळागौरीचा आठव येतो, तेव्हा श्रावण घमघमतो. साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातला आनंद ओसंडून वाहत असे. पूजेचं साहित्य, फुलपात्री, फराळाची तयारी, मुलींची बोलावणी… याची घाई उडत असे. त्यांचे लग्नातले शालू सळसळत असत. समवयस्क नवविवाहित मैत्रिणींचे हास्यविनोद, दबत्या आवाजातलं काही बोलणं… दोन-चार वर्षांपूर्वी निरोप दिलेल्या शाळेच्या आठवणी… पूजेची सामग्री सावरण्याची घाई… आरती, फराळ, जागरण, खेळ… माझ्या डोळ्यांवर झोप अनावर होई… त्यांच्या सौख्याचा गंध प्राजक्ताच्या फुलांतून, केवड्यातून ओसंडत असे. पतीचं नाव घेताना झक्क लाजणाऱ्या मुलींचे चेहरे घेऊन आलेला श्रावण आता लोपला. मंगळागौर पूजणाऱ्या त्या स्त्रियांचे संसार… त्यातले चढ-उतार पाहिले. त्यांनी धीरानं सोसलेली दुःखंही पाहिली… जीवनकहाणी सुफळ संपूर्ण होण्यासाठी त्यांनी मंगळागौरीला मागितलेलं वरदान किती खरं ठरलं… बालकवींच्या ‘श्रावणमासी हर्ष मानसी’ कवितेतल्या श्रावण महिन्याचं गीत ज्यांच्या चेहऱ्यावरून वाचून घ्यावं, अशा ‘ललना’ मी पाहिलेल्या आहेत… माझ्याच घरातल्या स्त्रियांनी श्रावणमासाचं सुरेल गाणं मला ऐकवलं आहे.

चित्रपटगीतांचा, भावगीतांचा पाऊस बरसत राहिला अन मी त्यातला श्रावण अलगद झेलला.

सावन-भादोची लयलूट असे गाण्यांतून. प्रियकरावाचून श्रावण म्हणजे भर पावसात जणू अग्नी तापतो आहे, श्रावणझडीसारखे डोळे झरत आहेत… अशा अर्थाच्या गीतांनी बहरलेल्या चित्रसृष्टीच्या गाण्यांतून माझ्या हाती पडलेल्या एक-दोन गाण्यांनी माझा श्रावण सजलेला आहे. सैगलच्या ‘देवदास’ मधल्या अजरामर गाण्यातली एक ओळ मला भिडते अन् त्यातल्या कारुण्यानं श्रावण भिजवून जाते……

 ‘सावन आया तुम ना आये… ‘

आजवर ऐकलेल्या श्रावणातल्या विरहगीतांतूनही ओळ नेमकी ओंजळीत येते.

‘बालम आये बसो मोरे मनमें ‘

या गीतातून सहा-सात दशकांचं अंतर पार होतं. ते जणू माझं सांत्वन करण्यासाठीच घडतं.

‘बंदिनी’तल्या शैलेंद्रच्या गाण्यातूनही मी श्रावण ऐकते.

‘अब के बरस भेज, भैय्या को बाबुल,

सावन में ली जो बुलाय के… ‘

लखनौकडे गायल्या जाणाऱ्या पारंपरिक चालीत बांधलेल्या गाण्यात आशाचा स्वर एका ओळीत रुद्ध होतो.

‘बैरन जवानीने छीने खिलौने

और मेरी गुडिया चुरायी

बाबुलजी मैं तेरे नाजोंकी पाली,

फिर क्यों हुई मैं परायी… ‘

सासर-माहेरमध्ये झुलणाऱ्या स्त्रीमनासाठी हिंदोळा नकोच. डोळे भिजायला पंचमीचा सण तरी कशाला हवा ! भातुकलीचा खेळ संपून खरा-खरा डाव हाती आला तरी ही हुरहूर का?

‘ क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे… ‘

… सारखा हा लपंडाव कशासाठी? श्रावण महिन्याची गीतं वाचायला ही आयुष्यं समजायला हवीत— की ती समजण्यासाठी श्रावण अनुभवायला हवा? मरगळलेल्या मनाला मात्र आता दूर रानात न्यायला हवं — बगळ्यांची माळ उडताना पाहायची आहे ना !

©  सुश्री सुलभा तेरणीकर

मो. 8007853288 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘गण ‘पती‘☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ शिक्षक दिन ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

आज शिक्षक दिन… सर्वप्रथम माझ्या सर्व शिक्षकांना माझा सादर प्रणाम !!!

मनुष्य उपजल्यापासून मरेपर्यंत काहीना काही शिकत असतो, ज्ञान प्राप्त करीत असतो. ते ‘ज्ञान’ का ? कसे ? कोणासाठी ? व कधी आचरणात आणायचे हे ‘विवेका’ने ठरवावे लागते असे अनेक ‘महाजनां’नी आपल्या आचरणातून दाखवून दिले आहे. हा ‘विवेक’ अंगी बाणवण्यासाठी अनेक जण आपल्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मदत करीत असतात मार्गदर्शन करीत असतात. ही सर्व मंडळी लौकिक अर्थाने किंवा पेशाने शिक्षक असतातच असे नव्हे!!

आद्यगुरू आई आणि बाबा. त्यांना माझा साष्टांग नमस्कार. पूर्व सुकृत चांगले असावे आणि भगवंताची कृपा झाली असावी, म्हणून मला उत्तम आईबाप लाभले.

सर्ग हा आपला एक उत्तम शिक्षक आहे. या सृष्टीत अनेक प्रकारचे जीव, जंतू, वनस्पती, प्राणी, पक्षी आहेत, ते आपापले जीवन जगत आहेत, परंतु त्यांच्यात वैर नाही, दुजाभाव नाही, मत्सर नाही, द्वेष नाही, स्पर्धा नाही…

यातील एक गोष्ट जरी आत्मसात करता आली तरी मनुष्याचे जीवन अधिक सुखरूप होईल, नाही का ? एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की जो मनुष्य आपल्याशी वाईट वागतो, (खरे तर तो त्याच्या स्वभावानुसार वागत असतो, त्यात चांगल वाईट काही नसते) तोच आपला उत्तम गुरू असतो. “चांगल वागणारी माणसे कसे वागावं हे शिकवतात आणि वाईट माणसे कसे वागू नये ते शिकवतात’. थोडक्यात सर्वजण आपल्यासाठी *गुरू*ची भूमिका पार पाडत असतात. त्यामुळे या सर्वांप्रति आपण कृतज्ञ राहायला हवे.

आजपर्यंत, मला असे अनेक ‘शिक्षक’ लाभले. त्यांच्यामुळे माझे जीवन समृद्ध होत आले आहे. ‘शिक्षकदिना’चे औचित्य साधून मी या सर्व ज्ञातअज्ञात ‘शिक्षकां’ना वंदन करीत आहे. परमेश्वर कृपेने मला लाभलेला हा अमूल्य वारसा पुढील पिढीला देण्याचा मी प्रयत्न करेन.

सर्व ज्ञात-अज्ञात शिक्षकांना ही शब्द सुमनांजली सादर समर्पण !!!

भारतमाता की जय!!!

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कालाय तस्मै नम: ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? विविधा ?

☆ कालाय तस्मै नम:  ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

सुखकर्ता, दु:खहर्ता श्री गणेश म्हणजे, प्राचीन काळापासूनचे हिंदू-धर्मीयांचे आराध्य दैवत. कोणत्याही देवतेचे पूजन करण्याआधी किंवा शुभकार्यास सुरुवात करण्याआधी श्रीगणेशाचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आजही मोठ्या श्रध्देने पाळली जाते. दरवर्षी भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते चतुर्दशी हे दहा दिवस, घरोघरी, गणरायाच्या मातीच्या मूर्तीत प्राणप्रतिष्ठा करून, तिची स्वतंत्र पूजा-अर्चा करण्याची प्रथाही गेली कित्येक वर्षे अखंडपणे पाळली जाते आहे. गणपती खरोखरच आपल्या घरी मुक्कामाला आले आहेत असे समजून, सारे घर, सारे वातावरणच त्यावेळी आनंदमय, चैतन्यमय होऊन जाते.

या घरगुती आनंदोत्सवाला, सार्वजनिक उत्सवाचे रूप द्यावे हा विचार सर्वप्रथम, स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळक यांनी केला. तो काळ पारतंत्र्याचा होता. सारा देशच त्यात भरडला जात होता. ब्रिटिश सत्तेच्या जुलुमाविरुध्द आवाज उठवलाच पाहिजे म्हणून टिळकांसारख्या साहसी व देशप्रेमी व्यक्ती निर्धाराने सज्ज झाल्या होत्या. एवढ्या ताकदवान सत्तेविरुद्ध लढणाऱ्यांची ताकदही तितकीच जोरकस हवी हे जाणून, त्या दृष्टीने, समाजातील सर्व थरांतील लोकांना एकत्र आणणे, त्यांच्यात एकजूट निर्माण करणे, आणि त्या माध्यमातून ती परकीय राजवट उलथवून टाकणे सर्वप्रथम गरजेचे होते, हे लोकमान्यांना तीव्रतेने जाणवले. पण उघड उघड असे लोकांना गोळा करणे म्हणजे सरकारी रोष ओढवून घेणेच होते. म्हणूनच अत्यंत तल्लख बुध्दिमत्ता लाभलेल्या लोकमान्यांनी, देवाच्या नावाखाली समाजाला एकत्र आणता येईल, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी त्यांचे प्रबोधन करता येईल, हा एक अचूक विचार केला व तोपर्यंत घरगुतीपणे साजरा होणारा गणेशोत्सव, सार्वजनिकपणे साजरा करण्याची नामी युक्ती शोधून काढली. समाजातल्या प्रत्येक घटकाने त्यानिमित्त एकत्र यावे, जातीभेद विसरून, एकोप्याने, विचारांची देवाणघेवाण व्हावी, जनतेचे त्यादृष्टीने प्रबोधन व्हावे, व स्वातंत्र्याच्या विचाराचे लोण आपसूकच मना-मनांमध्ये पसरून, सर्वांनी मिळून पारतंत्र्याविरुध्द एकजुटीने आवाज उठवावा, असा लोकमान्यांचा यामागचा विचार व उद्देश होता. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी देशभर अनेक दिशांनी प्रयत्न केले जात होते. महाराष्ट्रात लोकमान्यांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालेला असाच एक प्रयत्न होता. स्वातंत्र्याबाबत प्रबोधन करणारे अनेक वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम अशा उत्सवातून, सरकारला अजिबात शंका येणार नाही, याची व्यवस्थित काळजी घेत राबवले जाऊ लागले. आणि “स्वातंत्र्य” ही संकल्पनाच नव्याने माहिती झालेल्या अनेक देशवासियांसाठी ते अत्यंत प्रेरणादायक ठरू लागले…

यथावकाश भारताला स्वातंत्र्य मिळाले, लोकांचे स्वत:चे राज्य आले, तरी सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा जपली गेली. काही वर्षे खरोखरच खूप साधेपणाने, सोज्वळपणे हा उत्सव साजरा होत राहिला. त्यानिमित्ताने, उत्तम संगीत, उत्तम साहित्य, उत्तम कला यांचा आस्वाद सर्वसामान्यांनाही घेता यावा, यासाठी विशेष प्रयत्न केले जात असत. सार्वजनिक असूनही घरगुती वाटावा, अशा पावित्र्याने साजरा केला जाणारा, शब्दश: सर्वांचा, सर्वांसाठी असणारा हा उत्सव आहे असेच तेव्हा वाटत असे…

अर्थात सर्व सजग आणि सूज्ञ नागरिक हे सर्व काही जाणतातच.

पण स्वातंत्र्याचा परिपाक स्वैराचारात झाल्याचे अनेक सार्वजनिक क्षेत्रात जसे ठळकपणे दिसू लागले, तसे त्याचे पडसाद गणेशोत्सवावरही उमटू लागले अणि पहाता पहाता या सार्वजनिक उत्सवातले पावित्र्य, साधेपणा व आपलेपणाही हरवू लागल्याचे चित्र ठळकपणे दिसू लागले. ‘नको हा उत्सव’ असे वाटायला लावणारे त्याचे सध्याचे अनिष्ट रूप सूज्ञांना विचारात पाडणारे असेच आहे. सामाजिक भान ठेवून या निमित्ताने रक्तदानासारखे विधायक उपक्रम राबवणाऱ्या काही मोजक्याच मंडळांचा अपवाद वगळता, गणेशोत्सव म्हणजे धुडगूस, लोकांकडून बहुदा जबरदस्तीनेच गोळा केलेल्या ‘वर्गणी’ ची मूठभर लोकांकडून मनमानी उधळपट्टी, समाजहिताचा निर्लज्ज विसर, दुर्मिळ विजेची अनावश्यक व वारेमाप नासाडी, बेधुंदीसाठी नशेचा राजरोस वापर, आवाज, प्रकाश, धूळ यांचे प्रचंड प्रदूषण, त्यामुळे होणाऱ्या नागरिकांच्या हालांकडे सोईस्कर दुर्लक्ष, असे सर्वच आघाड्यांवरचे भेसूर चित्र पाहून, खरोखरच हतबल झाल्यासारखे वाटते. “ चला.. गणपती आले … आता जरा enjoy करू या “ एवढ्या एकाच उद्देशाने आता लोक गणपती ‘ बघायला’ मुलाबाळांसह आवर्जून बाहेर पडतांना दिसतात …आणि “ सार्वजनिकता “ या शब्दाचा मूळ अर्थच पार पुसला गेला आहे हे ठळकपणे जाणवते. लोकांच्या ‘एकत्र’ येण्याचा असा विघातक अर्थ आणि वापर, विचार करू शकणा-या सर्वांनाच खरोखरच अस्वस्थ करतो. या सगळ्या अनिष्ट आणि पूर्णतः अनावश्यक गोष्टींचा आपल्या मुलांवर तितकाच अनिष्ट आणि नकोसा असा विपरीत परिणाम नकळत होतो आहे, हे हल्लीच्या ‘शिकलेल्या’ पालकांच्या ध्यानीमनीही नसते ही खरोखरच सर्वांसाठी अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे.

खरे तर, लोकमान्यांच्या मनातला सार्वजनिक गणेशोत्सवामागचा उद्देश आणि या उत्सवाचे आत्ताचे बीभत्स स्वरूप यातली ही प्रचंड तफावत पाहिली, की ‘ हे पाहण्यास लोकमान्य इथे नाहीत ते बरेच आहे ’ असे वाटल्याशिवाय रहात नाही… आणि असेही खात्रीने वाटते की ते असते, तर ज्या करारीपणाने, धडाडीने आणि देशाच्या तेव्हाच्या परिस्थितीत अतिशय दूरदर्शी अशा विचाराने त्यांनी हा उत्सव सुरू केला होता, तितक्याच.. किंबहुना त्याहीपेक्षा जास्त करारीपणाने त्यांनी हा उत्सव बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असते….. अर्थात सतत बदलणारा काळ, प्रत्येक क्षेत्रात अकारण लुडबूड करणारे- स्वार्थाने बरबटलेले ‘ स्वदेशाचे राजकारण (?) ‘, आणि विचार करू शकणाऱ्या प्रत्येक जागरूक पण हतबल, आणि ‘ पण मी एकटा काय करू शकणार ? ‘ असा नाईलाजाने विचार कराव्या लागणाऱ्या नागरिकाला चिंतेत पाडणारी भरकटलेली.. दिशा चुकलेली सामाजिक मानसिकता – या सध्याच्या दारुण आणि दुर्दैवी परिस्थितीत लोकमान्यांना तरी हे काम आधीच्या सहजतेने करणे शक्य झाले असते का.. किंबहुना ( with due respect ) शक्य तरी झाले असते का ? — हा प्रश्न नक्कीच पडतो… वाऱ्याबरोबर तोंड फिरवणारे so called मुत्सद्दी राजकारणीच त्यांना असं करूच देणार नाहीत असं खात्रीने म्हणावसं वाटतं.

तसंही हा उत्सव आता खऱ्या अभिप्रेत अर्थाने “ सार्वजनिक “ राहिला आहे असं म्हणणं म्हणजे धादांत खोटं बोलण्यासारखंच आहे. सामाजिक मानसिकता जराशी तरी बदलू शकेल अशी शक्यता निर्माण करू शकणारा ‘ एक गाव एक गणपती ‘ हा साधा सोपा मार्ग सुद्धा हल्लीच्या तथाकथित दादा-भाऊ-अण्णा-काका-साहेब अशी ‘बिरुदं’ स्वतःच स्वतःला चिटकवणाऱ्या नेत्यांनाच विचारातही घ्यावासा वाटत नाही हे समाजाचे कमालीचे दुर्दैव आहे. आणि त्याची कारणे आता सगळा समाजच जाणतो.. पण.. पण तसे जाहीरपणे बेधडक बोलण्याची हिम्मत असणारा आणि त्याविरोधात लढण्यासाठी स्वतः सज्ज झालेला एकही अध्वर्यू “ लोकमान्य “ स्वातंत्र्योत्तर काळात उदयाला आलेला नाही हेच तर या देशाचे अतीव दुर्दैव आहे.

फक्त सार्वजनिकच नाही, तर घरगुती गणेशोत्सवातही काळानुरूप खूपच फरक पडलेला दिसतो. पूर्वीची एकत्र कुटुंबे विभक्त झाली, घरातल्या स्त्रीला अर्थार्जनासाठी बाहेर पडावे लागले. या सर्वांचा अटळ असा परिणाम, घरगुती गणेशोत्सवावरही अपरिहार्यपणे झालेला दिसतो. जगण्यासाठीची लढाई दिवसेंदिवस तीव्र होत असतांना, एकत्रितपणे सण-उत्सव साजरे करण्यातला निखळ आनंद, त्यानिमित्ताने सर्वांनीच एकमेकांना अधिक जाणून घेणे, एकमेकातले आपलेपणाचे बॉंडिंग नकळत वाढवणे, जबाबदारी वाटून घेणे आणि ती पेलण्यास उत्सुक होणे, आणि यातून निर्माण होणारी प्रसन्नता एकत्र साजरी करणे, हे सगळेच आता कुठेतरी हरवल्यासारखे.. खरं तर लोप पावल्यासारखे वाटते आहे.

घड्याळाचे गुलाम झाल्यावर, गणपतीसाठीही आता मोजून मापूनच वेळ उपलब्ध असतो, व तेवढ्याच वेळात या उत्सवाचे सर्व सोपस्कार बसवावे लागतात, ही अपरिहार्य म्हणावी अशी जीवनशैली बहुतेकांना बहुदा मनाविरूध्द स्वीकारावी लागलेली आहे. आणि हळूहळू ती अंगवळणीही पडलेली आहे. मग एकाच गावातले दोन भाऊ, गणपतीला एकमेकांकडे चार दिवस का होईना निवांत भेटतील, एकत्रपणे साग्रसंगीत पूजा-प्रार्थना करतील, घरीच हौसेने बनवलेल्या विविध नैवैद्यांवर ताव मारतील, आणि अगदी मनापासून या उत्सवात रममाण होतील, हे चित्र स्वप्नवत वाटू लागल्यास नवल नाही, आणि यात कुणाचीच, अगदी कळत-नकळत चूकही नाही, असे आजकाल अगदी प्रांजळपणे वाटत रहाते… तरीपण.. अगदीच न सोडवता येण्याइतका हा प्रश्न जटिल आहे का ?.. या प्रश्नाचे उत्तर नक्कीच नकारार्थी असायला हवे… यात अडचण फक्त एकच —- “ मी.. आणि माझे.. “ ही फक्त शरीरानेच नाही तर मनानेही मनापासून विभक्त करायला लावणारी ‘ आधुनिक ‘ आणि so called अत्यावश्यक मानली जाऊ लागलेली व्यक्तिगत मानसिकता… जी खरोखरच चिंताजनक आहे…. मग सामाजिक मानसिकतेचा विचारही सहज वेड्यात काढता येण्यासारखा…. ‘ असो ‘.. एवढेच एखादा सुजाण आणि दूरदर्शी असणारा माणूस म्हणू शकतो नाही का ?…. तर “ असो “.

पण.. पण … नुकत्याच दोन आशादायक आणि आनंददायक बातम्या कळल्या आहेत त्या अशा की…….

१ ) नुकताच अनेक ठिकाणी सार्वजनिक दहीहंडीचा जोरदार कार्यक्रम पार पडला. त्यातली एक हंडी होती पुण्यातल्या मंडईजवळ असलेल्या लोकमान्यांच्या पुतळ्यासमोरच्या रस्त्यावर बांधलेली – नेहेमीसारखीच – पण या वर्षी विशेषत्वाने सांगायलाच हवा असा बदल म्हणजे त्या परिसरातल्या चक्क ३५ मंडळांनी एकत्र येऊन एकच हंडी बांधली होती …. आणि हा उत्सव यशस्वीरित्या साजरा केला होता. भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव ट्रस्ट या मानाच्याच मंडळाच्या पुनीत बालन नावाच्या तरुणाने यासाठी पुढाकार घेतला होता आणि अंधारलेल्या सामाजिक मानसिकतेला आशेच्या उजेडाचा एक कोवळा कोंब फुटल्याची आनंददायक जाणीव झाली.

२ ) दुसरी बातमी गणेशोत्सवाची. कसबा गणपती हे पुण्याचे आराध्यदैवत, आणि देवस्थानाचा गणपती हा उत्सवातील मानाचा गणपती. तरी त्या चिंचोळ्या आणि गजबजलेल्या कसबा पेठेत गल्लोगल्ली अनेक मंडळे त्यांचा स्वतंत्र उत्सव साजरा करत होते आणि रहिवाशांना मुकाट त्रास सहन करावा लागत होता. पण या वर्षी देवस्थानाने असा प्रस्ताव मांडला आहे की संपूर्ण कसबा पेठेचा मिळून एकच सार्वजनिक गणपती बसवायचा आणि सहभागी प्रत्येक मंडळाने, त्यांनी गोळा केलेल्या वर्गणीतून एकेक दिवस आरतीचे सर्व नियोजन … सर्व खर्च सांभाळायचा…. आणि तिथल्या इतर सगळ्या मंडळांनी ह्या प्रस्तावाला चक्क मान्यता दिलेली आहे असे समजते. ….

‘सारासार आणि सामूहिक विचार उत्तम काम करायला उद्युक्त करतो ‘.. हा लोकमान्यांचा महत्वाचा विचार आणि उद्देश पुन्हा असा नव्या मार्गाने नव्या प्रकारे रुजू लागला तर त्यापरता दुसरा आनंद तो कोणता ?

… यावर्षी सुखकर्ता दु:खहर्ता या आरतीबरोबरच ‘आता हा नवा सकारात्मक विचार समाजात पक्का रुजू दे.. फुलू दे फळू दे.. ‘ ही प्रार्थना मनापासून करत गणपतीला नमस्कार करता करता, आपण त्या जोडीने असेही आवर्जून म्हणू की- ‘‘कालाय तस्मै नम:”

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘गण ‘पती‘☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ गण ‘पती… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

चौदा विद्या आणि चौसष्ट कला यांची अधिष्टात्री देवता म्हणजे गणपती. प्रामुख्याने प्रचलित असलेली गणपतीची रूपे खालील प्रमाणे आहेत. कोणी त्याला लंबोदर म्हणतं, तर कोणी वक्रतुंड, कोणी मोरया तर कोणी भालचंद्र, कोणी सुखकर्ता तर कोणी दुखहर्ता, कोणी सिद्धिविनायक तर कोणी वरदविनायक. अशी बरीच नावे आपापल्या श्रद्धेनुसार भक्तांनी गणपतीला बहाल केली आहेत आणि गणपतीने देखील वेळोवेळी आपल्या भक्तांच्या हाकेला धावून जाऊन वरील सर्व संबोधने सार्थ सिद्ध केली आहेत. खरंतर कोणत्याही देवतेचे सर्व गुण हे आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी, सर्वांगीण उन्नतीसाठी, सकल मंगल साधण्यासाठीच असतात. त्या देवतेच्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा त्या देवतेचे महात्म्य वाढविणे असा त्यामागील हेतू नसतो. थोडा सूक्ष्म विचार केला तर आपल्या असे लक्षात येईल की साधना किंवा भक्ती वृद्धिंगत व्हायला लागली की त्या त्या उपास्य देवतेचे गुण त्या साधकाच्या/भक्ताच्या अंगात प्रगट व्हायला लागतात आणि त्या गुणांमुळेच त्या भक्तांचे संकट हरण होते. पू. रामकृष्ण परमहंस यांनी अनेक प्रकारच्या साधना /उपासना केल्या. जेव्हा त्यांनी हनुमंताची उपासना केली तेंव्हा त्यांना हनुमंताप्रमाणे शेपूट फुटले होते असे वर्णन त्यांच्या चरित्रात आढळते

मला मात्र गणपतीच्या ‘गणपती’ या नावा बद्दल आणि कार्याबद्दल विशेष आदर आहे. ‘गण’ हा संस्कृत शब्द असून त्याचा समूह असा अर्थ होतो. एका अर्थाने गणपती ही नेतृत्वगुण असलेली सामाजिक देवता आहे. कुशल नेतृत्वगुण दाखविणारे, समाजातील सर्व घटकांना एकसंघ करणारे आणि त्यांना कार्यप्रवृत्त करून विजयी बनविणारी देवता म्हणजे गणपती. सैन्य म्हटले की त्यात अनेक सैनिकांचा समावेश होतो. सैनिकांना अनेक कौशल्ये आत्मसात असावी लागतात, अमुक एक गोष्ट येते आणि अमुक गोष्ट येत नाही, असे सैनिक म्हणू शकत नाही. सैनिकाला एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढावे लागते आणि म्हणूनच या सर्वांचे नेतृत्व करणाऱ्या गणपतीकडे चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचे अधिपतीपद आले असावे. एक कल्पना अशी करता येईल की गणपती ही देवता असेलही, पण असे समाजाला संघटीत करून, योग्य नेतृत्व देऊन आणि त्याला कार्यप्रवण करणारे नेतृत्व जेंव्हा जेंव्हा आपल्या समाजात पुढे आले किंवा प्रयत्नपूर्वक संकल्पपूर्वक प्रस्थापित केले गेले, तेंव्हा तेंव्हा आपण विजयी झालो असे इतिहास सांगतो. अनेक राजे, महाराजे, क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक या गुणांचे निःसंशय आदर्श आहेत.

खरंतर आपले सर्व सण हे सामाजिक अभिसरण, संस्कृती आणि पर्यावरण रक्षणाचे प्रतीक आहेत असे म्हटले तर नक्कीच सार्थ ठरेल. मधल्या काळात आपण हे सर्व विसरून गेलो होतो. पण आपल्याकडील सामाजिक आणि राजकीय पुनरुत्थानाचे/ पुढाऱ्यांचे अर्ध्वयु लोकमान्य टिळक यांनी या उत्सवाची सामाजिक बाजू आणि परिणामकारकता बरोबर हेरली आणि ‘माजघरा’तील गणपतीला ‘रस्त्यावर’ आणले ( सार्वजनिक केले) आणि त्यातून सामाजिक उन्नती साधण्याचा, बंधुभाव वाढविण्याचा आणि समाजातील जातीभेद नष्ट करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. ब्रिटिश सरकार विरुद्ध वातावरण तयार करण्यासाठी सुद्धा त्याचा प्रभावी माध्यम म्हणून उपयोग झाला. एक सामाजिक चळवळ म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव ही संकल्पना जनमानसात लोकमान्यांनी रुजवली आणि आज सुद्धा अपवाद वगळता ही सर्व मंडळे सामाजिक उत्थानाचे कार्य करीत आहेत.

सार्वजनिक गणपती आणि खासगी गणपती आपल्याकडे मोठ्या प्रमाणात प्राण प्रतिष्ठित केले जातात. लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेले कार्य जर आपण त्या माध्यमातून करू शकलो तर ती खऱ्या अर्थाने सामाजिक उत्थापन करणारी सर्वात मोठी चळवळ ठरेल, त्यासाठी कालानुरूप या चळवळीत शिरलेल्या अनिष्ठ प्रथा आपल्याला खंडित कराव्या लागतील. त्या काळात ब्रिटिशांशी लढायचे होते, आज मात्र आपले स्वकीयच शत्रू आहेत. आणि खरं तर आपली लढाई आपल्याशीच आहे. “रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग” अशी आपली प्रत्येकाची परिस्थिती आहे. पण ही लढाई तशी सोपी नाही, कारण शत्रू समोर दिसत नसल्यामुळे त्याचा प्रतिकार करणं अवघड आहे. मनातील सहा विकारांशी लढायचे आहे. त्यासाठी आपल्याला मन, बुद्धि, चित्त, वित्त, या सर्वांच्या साहाय्याने अंतर्मनातील या विकारांवर विजय मिळवायचा आहे. यात मन हे गणपतीचे प्रतीक आहे. मन गणपती होण्यासाठी मात्र आपल्याला साधना करावी लागेल, त्यासाठी आपल्याकडे अनेक मार्ग आहेत.

‘गणपती उत्सव’ साजरा करीत असताना मी व्यक्तिगत स्वरुपात काय काय करू शकतो याचा आपण थोडा विचार करूया. बहुतेक आपल्याही मनात असेच काही आले असेल. कारण सर्वाना बुद्धि देणारा एक गणपतीचं आहे.

# आजपासून माझा गणपती पर्यावरणानुकूल असेल.

# प्लास्टिक, थर्माकोल, मेणाचे दिवे, चिनी तोरणे यांचा वापर करणार नाही.

प्रसाद म्हणून घरी केलेला कोणताही पदार्थ असेल.

# कर्ण मधुर भारतीय संगीत असेल. (चित्रपट गीते नसतील)

# गणपतीच्या मूर्तीच्या उंचीची स्पर्धा न करता त्याचे गुण आत्मसात करुन माझ्या व्यक्तिमत्वाची उंची वाढविण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन.

# गणपतीच्या आरत्या शुद्ध स्वरूपात आणि तालात म्हणेन.

# माझे गणपती स्तोत्र किंवा अथर्वशीर्ष तोंडपाठ असेल.

# आजपासून रोज सामूहिक रित्या गणपती स्तोत्राचे पठण करू.

# गणपती विद्येची देवता असल्यामुळे शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना मी यथाशक्ती मदत करेन.

# आपण आपल्या कल्पकतेनुसार यात अनेक उपक्रमांची भर घालू शकतो.

आज चतुर्थीच्या निमित्ताने आपण सर्वानी मनाला ‘सबळ’ करण्याचा आणि आपल्याला शरीरातील सर्व इंद्रियांवर मनरुपी गणपतीच्या सहाय्याने विजय मिळवण्याचा संकल्प करूया. सुखकर्ता गणपती आपणा सर्वांना नक्कीच साहाय्यभूत होईल.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ याला जीवन ऐसे नाव… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

?  विविधा ?

☆ याला जीवन ऐसे नाव… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

जीवनाचा अर्थ अनेकजणांनी वेगवेगळ्या पध्दतीने सांगितला आहे. हे सांगताना, त्यांना आलेले अनुभव आणि एकूणच त्यांचे भावविश्व त्यातून दिसून येते.

भारताचे एक ज्येष्ठ क्रिकेटवीर सुनील गावस्कर एका गीतात हे ‘जीवन म्हणजे क्रिकेट राजा’ असं म्हणतात तर ‘आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे’ असं गीतकार अवधूत गुप्ते यांना वाटतं. कुणाला असं वाटतं की, माणसाचं जीवन हे दैवाच्या हातातलं खेळणं आहे. दैववादी लोक असं ‘प्राक्तन’हे महत्वाचं आहे, असं मान्य करतात तर, प्रयत्नवादी ‘तळहातावरच्या रेघा हे आपलं भविष्य ठरवत नाही तर, त्या तळहातामागील मनगट हे आपलं जीवन घडवतं’ असं म्हणतात.

माणूस हा या पृथ्वीवरील सर्वात बुध्दीवान सजीव आहे. आपली बुध्दी आणि कौशल्याच्या आधारे त्याने अनेक अवघड बाबी सहजसाध्य केल्या आहेत. माणसाच्या या कर्तृत्वाला शब्द देताना, ‘माणूस माझे नाव’ या कवितेत बाबा आमटे म्हणतात,

“बिंदु मात्र मी क्षुद्र खरोखर,

परी जिंकले सातहि सागर,

उंच गाठला गौरीशंकर…

 साहसास मज सीमा नसती,

नवीन क्षितिजे सदा खुणावती,

दूर दाट निबिडात मांडला पुन्हा नवा मी डाव,

माणूस माझे नाव”.

अमिताभ बच्चन यांना भारतीय चित्रपट क्षेत्रातील ‘बीग बी’ म्हणून ओळखले जाते. एक वेळ अशी आली, जेव्हा अमिताभ बच्चन इतके समस्यांच्या दरीत फेकले गेले की, चित्रपट क्षेत्रात त्यांना प्रचंड अपयश आलं, ज्या राजकारणात त्यांनी उडी घेतली होती, तिथेही ते अपयशी ठरले आणि त्यांनी चित्रपटसंन्यास घेतला, चित्रपट निर्मितीसाठी ए. बी. सी. एल्. नावाची जी कंपनी सुरू केली होती तिही डबघाईला येऊन ते दिवाळखोर बनले. कर्जदार घरी येऊन धमक्या देऊ लागले. अशा बिकट प्रसंगी, अमिताभ बच्चन यांनी, यश चोप्रांकडं जाऊन, “मला काम द्या” अशी विनवणी केली. त्यानंतर जिद्द, प्रचंड काम यातून, त्यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेतली. आज भारतीय समाजमनावर राज्य करणारे, शतकातील महानायक म्हणून त्यांचा गौरव केला जातो (१).

फाळणीनंतरची अंगावर शहारे आणणारी आणखी एक सत्यकथा…

सीमेजवळच्या एका खेड्यात(जे खेडं बाहेरच्या जगापासून खूप दूर होतं)काही बाहेरच्या लोकांकडून, या गावातील लोकांवर भीषण हल्ला होतो. या नरसंहारात, तलवारीने घायाळ झालेला एक असहाय्य बाप आपल्या १५ वर्षाच्या लहान मुलाला म्हणतो,

“भाग मिल्खा भाग, जीव वाचव, इथून लगेच पळून जा”. वडलांची ती आज्ञा शिरसावंद्य मानून भेदरलेला लहानगा मिल्खा पळून भारतात येतो. वडलांचे अखेरचे शब्द जीवनासाठीचा संदेश मानून, प्रचंड मेहनतीने भारताचा वेगवान धावपटू बनतो. एका अटीतटीच्या धावण्याच्या लढतीत लाहोरमध्ये एका अव्वल पाकिस्तानी धावपटूला तो हरवतो आणि तत्कालीन पाकिस्तानी राष्ट्रप्रमुख आयुबखान यांच्याकडून  ‘फ्लाईंग सीख ‘ हा किताब मिळवतो (२).

भारतीय मनांवर प्रभाव पाडणारी दोन तत्वज्ञानं काय म्हणतात?

‘तूच तुझ्या जीवनाचा दीप बन (अत्त दीप भव)’ असं गौतम बुद्ध म्हणतात. तर श्रीमद्भगवद्गीता सांगते की, ‘हे माणसा, तूच तुझा उध्दार कर (ऊध्दरेदात्मनात्मानम्)’.

… अशी महावाक्यं किंवा काही यशस्वी ठरलेल्यांचं जीवन जरी सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायक असली तरी एक बाब लक्षात घेतली पाहिजे, आणि ती म्हणजे, आजचा माणूस हा बेटावर एकटादुकटा रहाणारा प्राणी नाही तर, भोवताल (नैसर्गिक पर्यावरण आणि समाज) त्याचे यशापयश ठरवण्यास कारणीभूत असतात. यादृष्टीने तारतम्य बाळगून, निर्णय घेणे शहाणपणाचं ठरतं.

दोन उदाहरणं घेऊ…..

महाभारत काळातील भारतीय संस्कृतीतील एक यशस्वी नायक म्हणून श्रीकृष्णाचे नाव घेतलं जातं. आपलं अंतिम उद्दिष्ट लक्षात घेऊन श्रीकृष्णानं प्रसंगी, ‘रणछोडदास’ असा उपहासात्मक शेराही ऐकून घेतला. अलिकडच्या काळातील एक द्रष्टा राजा, छत्रपती शिवाजी महाराज. अफझलखान नावाचं महाबलशाली आणि तितकेच क्रूर संकट आल्यावरही, उघड्यावर त्याच्याशी सामना न करता, एका रणनितीने खानाचा पराभवच नव्हे तर, खातमा करण्याचं कौशल्य हे असंच अनुकरणीय आहे. म्हणूनच जगात अनेक ठिकाणी महाराजांचा एक कुशल, मुत्सद्दी व्यवस्थापन कलेतील वाकबगार सेनानी या भूमिकेतून अभ्यास केला जातो.

यासाठी, दुर्दम्य आशावाद, नेमकेपणाने ध्येयाची निवड, प्रयत्न यांचबरोबर, आलेले अपयश हा अनुभव समजून, त्यापासून धडा घेऊन, प्रसंगी साधनांना मुरड घालून, काही तडजोडी, तर कधी परिस्थितीशी जुळवून घेऊन, ध्येयाकडं वाटचाल करणं, हे नैसर्गिक शहाणपण ठरतं.

अखेरीस व्यवहारात माणूस जन्मतो तेव्हा श्वास घेऊन; एकदा का तो श्वास बंद झाला की, माणूस मरतो.

श्रेष्ठ मराठी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या शब्दांत;

‘अरे जगनं मरनं,

एका सासाचं अंतर’.

…… म्हणून लढण्यासाठी, जिवंत रहाणं हे श्रेष्ठ मूल्य ठरतं.

(संदर्भ: १ आणि २- आर. जे. कार्तिक यांची व्याख्याने.) 

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

ईमेल- [email protected]

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आदर्शतेचा वारसा जपणारे – एक शिक्षकांचे गाव… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

🌸 विविधा 🌸

☆ आदर्शतेचा वारसा जपणारे – एक शिक्षकांचे गाव… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

(शिक्षक दिन विशेष) 

शिक्षक आणि समाज, गाव याचे खूपच निकटचे संबंध असतात. पुर्वी खेड्या-पाड्यातून गावातील शिक्षकांना लोक खुप मानत असत. गावात होणाऱ्या अनेक घरगुती कार्यक्रमातून शिक्षकांचा आवर्जून सहभाग होत असे. अनेक बर्‍या-वाईट प्रसंगात शिक्षकांचा सल्ला घेतला जायचा. इतकेच काय फार पुर्वी गावात एखांद्याचे पत्र आले तरी लोक ते पत्र गावातील शिक्षकांकडून वाचून घेत असत. घरगुती कार्यक्रमातून शिक्षकांचे आदरातिथ्य पण मोठ्या कौतुकाने होत असे. इतके समाजात शिक्षकांचे महत्त्व होते.

आज बदलत्या काळानुसार लोक बदलले. आणि समाज बदलत चालला आहे. आज समाजात पुर्वी असणारे शिक्षकांचे स्थान कुठेतरी मावळताना दिसत आहे. तरी सुध्दा मला एका गावाची गोष्ट मोठ्या कौतुकाने सांगावी वाटते. सांगली जिल्ह्य़ातील शिराळा तालूक्यात उत्तरेकडे पणुंब्रे-घागरेवाडी हे डोंगराच्या कुशीत वसलेले एक गाव आहे. खरोखर या गावाला ‘ आदर्श शिक्षकांचा ‘ गाव असे म्हटले तर काय वावगे ठरणार नाही. तुम्ही या गावाला भेट द्याल तर प्रत्येक गल्लीत एक तरी आजी -माजी शिक्षक तुम्हास भेटतीलच. आणि या सर्वच शिक्षकांचे गावच्या शैक्षणिक विकासात खूपच मोलाचे सहकार्य आहे.

या गावात जुन्या काळातील शिक्षक बी. एम. पाटील गुरूजी, एम. जी. पाटील गुरूजी, तसेच पांडुरंग घागरे गुरूजी, रंगराव भोसले गुरुजी, तानाजी परीट गुरुजी, आणि आदर्शतेचा वारसा जपणारे, अत्यंत शिस्तप्रिय असे तुकाराम बळवंत पाटील (तात्या गुरुजी) आजही त्यांचा आदर्श आणि शिस्त विद्यार्थ्यांमध्ये आहे, तसेच प्रसिद्ध कीर्तनकार मा. पी. सी. पाटील सर ( मराठीचे प्राध्यापक ), एम. टी. घागरे सर, कै शामराव पाटील गुरूजी, इत्यादी अनेक शिक्षकांचा वारसा या पणुब्रे-घागरेवाडी गावास लाभला. या सर्व गुरुजनांनी घडविलेले अनेक विद्यार्थी व याच गावचे सुपुत्र देशात व देशाबाहेर देखिल चांगल्या हुद्द्यावर कार्यरत आहेत. गावातील मुले-मुली आज संपुर्ण क्षेत्रात कार्यरत आहेत. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, साहित्यिक, देशसेवेत, क्रिडा, कला, वैद्यकीय, वैज्ञानिक, औद्योगिक अशा प्रत्येक क्षेत्रात या गावातील अनेक युवक-युवती कार्यरत आहेत तर काही सेवानिवृत्त झाले आहेत. हे सर्व श्रेय या गावच्या शिक्षकांचे आहे या सर्व शिक्षकांनी फक्त चार भित्तीच्या आत शाळेतच विद्यार्थी घडविले नाहीत तर ते सदैव गावचा विद्यार्थी शिकून मोठा व्हावा, पंचक्रोशीत गावाचे चांगले नाव असावे म्हणून ही सर्व शिक्षक मंडळी सदैव झटत राहिले. आज या सर्व माजी शिक्षकांचे कितीतरी विद्यार्थी सेवानिवृत्त आहेत. पण गावात वावरताना समोरून त्यांचे हे सर्व माजी शिक्षक भेटले तर त्यांच्याबद्दलाचा तोच आदर, आणि आपले गुरूजी म्हणून त्यांच्याबद्दल तोच सन्मान नजरेत असतो. हेच या गावातील सर्व माजी शिक्षकांच्या ज्ञानाचे फळ आहे. पणुंब्रे-घागरेवाडी येथील दोन्ही मराठी शाळांना ‘ स्वच्छ सुंदर शाळा ‘ आणि ‘आदर्श शाळा ‘ असे पुरस्कार प्राप्त आहेत.

आज याच माजी शिक्षकांच्या आदर्शतेचा वारसा पुढे नेणारे याच गावचे अनेक आजी शिक्षक आहेत. या गावातील न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक मा. बाजीराव पाटील सर, पणुंब्रे मराठी शाळेत असणारे शिराळा तालूक्यात आदर्श शिक्षक म्हणून ज्यांचा सन्मान आहे ते मा. विलास घागरे सर, तसेच अशोक तातोबा घागरे सर, गावातीलच मा. यटम सर, इ. कितीतरी माजी शिक्षकांचे विद्यार्थी असणारे हे सर्व आजी शिक्षक गावच्या शैक्षणिक, , सामाजिक, तसेच सांस्कृतिक विकासासाठी झटत आहेत. हे सर्व आजी शिक्षक या माजी शिक्षकांचेच विद्यार्थी आहेत.

तसेच पणुंब्रे गावच्या पहिल्या महिला शिक्षिका कै. सावित्री भोसले पाटील मॅडम (पाचुंब्री), घागरेवाडीच्या पहिल्या शिक्षिका सध्या शिराळ्यात कार्यरत असणार्‍या आदर्श शिक्षका सौ. अनुराधा पाटील -घागरे मॅडम(बिऊर), सौ. जयश्री पाटील मॅडम, मुंबई येथे प्रिन्सिपल असणाऱ्या सौ. कविता पवार – भोसले मॅडम(ऐतवडे), प्रा. सौ. गीतांजली पाटील मॅडम या सर्व शिक्षिका याच गावच्या माहेरवाशीण आहेत त्या सुध्दा आपल्या सासरी जाऊन आदर्श शिक्षकेचा वारसा जपत आहेत तो याच गावचा आदर्श ठेवून.

खरोखर या पणुंब्रे-घागरेवाडी गावचा शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विकासात या सर्व आजी-माजी शिक्षकांचे ज्ञानदानाचे योगदान खुपच अमुल्य आहे. हे सर्वजण शिक्षक म्हणून गावाला लाभले हे या गावचे श्री भैरवनाथ कृपेने मोठे भाग्य आहे. म्हणून म्हणावे वाटते ” ज्या गावाला, समाजाला चांगले शिक्षक लाभले तो गाव विकासापासून कधीच दूर रहात नाही. “

मोठ्या अभिमानाने शेवटी लिहावे वाटते, असे शिक्षकांचे गाव मला माहेर म्हणून लाभले हे मी माझे थोर भाग्य मानते. येथील शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाचीच ही माझी शब्दपुष्पे शुभेच्छा म्हणून या सर्व शिक्षकांना देत आहे.

“शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षकांना खूप खूप शुभेच्छा”

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा, जि. सांगली, दुरभाष्य क्रमांक-९९२२७३०८१५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares