मराठी साहित्य – विविधा ☆ “ळ कार…” भाग – १  ☆ श्री श्रीनिवास गोडसे ☆ श्री श्रीनिवास गोडसे ☆

श्री श्रीनिवास गोडसे

? विविधा ?

☆ “ळ कार…” भाग – १  ☆ श्री श्रीनिवास गोडसे

(एक मे…मराठी राजभाषा दिनानिमित्त)

27 फेब्रुवारी— मराठी भाषा गौरव दिन.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांचा हा जन्मदिवस. या दिवशी अचानक मनात एक कल्पना आली आणि त्यावर सत्वर अंमलबजावणी देखील केली. मी एक अक्षर आणि त्या अक्षरासोबत ळ जोडून आलेले शब्द याची माहिती पाठवायची सुरुवात केली आणि अ पासून ज्ञ पर्यंत पोहोचता पोहोचता २५ दिवस सलग हा कार्यक्रम झाला. जवळपास दोन हजाराच्या आसपास शब्द हाताशी लागले. यामध्ये अनेक शब्द नव्याने वाचनात आले. फार मजा आली हा उद्योग करताना. सर्वोच्च शब्द ळ ने म आणि व यांच्याबरोबर साधले आहेत. त्याचप्रमाणे ळ बरोबरचे सर्वोच्च दहा जोडीदार काढायचे म्हटले तर प्रथम स्थान म, व, प, क, स, ग, ह, ब, भ आणि स या (सर्वोच्च10) बरोबर जवळपास 58% शब्द ळ बरोबर आले आहेत.

ळ नाही तर मराठी कशी होईल याचा अनुभव घ्यायचा आहे तर पहा…

समजा मी बोललो वा लिहिले…

“अवचिता परिमलु झुलकला आलू मालू

मी म्हणे गोपालु आला गे माये”

लवथवती विक्राला ब्रम्हांडी माला

विषे कंठ काला त्रिनेत्री ज्वाला

घननिला लडिवाला…

अरे अरे.. ! वाचवत नाही आणि बघवत नाहीत हे मराठीचे हाल

ळ ऐवजी ल या अक्षराचा वापर केला तर काय घोळ होतो याचे हे उत्तम उदाहरण आहे.

हिंदीत ळ अक्षर वापरले जात नाही, पण मराठी बरोबर तमिळ, तेलगू, मल्याळम, गुजराती, कन्नड, तुळू, कोकणी, राजस्थानी, हरीयाणवी भाषेत वापरले जाते. त्यातील काही भाषांमध्ये ळ लिहिताना त्याच्या खाली टिंब म्हणजे नुक्ता (ऴ) दिला जातो. हिंदी ही संस्कृतची लेक परंतु तिच्या वर उर्दू, फारशी, अरबी भाषेचे संस्कार आणि स्थानिक उच्चार परंपरा यामुळे ळ चा वापर दुर्मिळ झाला.

पण म्हणून खालील शब्द पहा ना ! ज्याच्यामध्ये ळ आणि ल चा बदल झाला तर अर्थात प्रचंड फरक होतो…

अंमल- अंमळ

वेल – वेळ

खल – खळ

पाल – पाळ

नाल – नाळ

कल – कळ

लाल – लाळ

ओल – ओळ

मल – मळ

चाल – चाळ

दल – दळ

छल – छळ

काल – काळ

गलका – गळका

बघितले ?

तर आपल्या मराठी लोकांना गरजच नाही की याचे अर्थ वेगळे सांगावेत…

हिंदीचा भाषा म्हणून जरूर अभिमान आहे आणि तिचा मानही नक्कीच मोठा आहे पण म्हणून ळ ऐवजी ल वापरावा लागू नये हे मात्र नक्की. कारण ळ मध्ये एक वेगळा गोडवा आहे. ळ ला त्याचे ‘अढळ’ पद मिळावे म्हणून प्रकाश निर्मळ या व्यक्तीने खूप मोठा लढा सरकार दरबारी दिला. अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर सुधारित हिंदी वर्णमालेत ळ ला त्याचे विशेष असे अढळ स्थान नुकतेच मिळवून दिले. त्यावरचा वेगळा लेख जिज्ञासूं करिता आंतरजाल अर्थात इंटरनेटवर उपलब्ध आहे…

तर मंडळी ळ आपल्या मराठीजनांचा खूप खूप आवडता उच्चार आहे

अगदी बघा ना…

“भरल्या मळवटाने आलेली मावळण, तिला यथावकाश डोहाळे लागतात, तीचे नव्हाळी अनुभवताना आवळे-चिंचेसह अनेक डोहाळे पुरवले जातात. बाळंतपण इस्पितळात पार पडते, बाळ होते (जुळे, तिळे, आवळे-जावळे) नाळेपासून बाळाला वेगळे केले जाते, मग पाळणा आंदोळुन बारसे होते. खेळणी म्हणून खुळखुळा दाखवला जातो, बाळलेणी म्हणून रुणझुण वाळा घातला जातो. बाळ पळू लागते. तोंडाचे बोळके पसरून खिदळू लागते. कधी कधी तर घळाघळा रडून अश्रू ढळू लागते,

तेव्हा सहज येणारे

उळुउळुउळु बाळा ss

हात ग माऊ…

आठवा…

हळूहळू बाळ गुळुगुळु बोलू लागते. त्याच्या पायात वाळा घातला जातो. काजळाचा टिळा लावला जातो.

‘अडगुळं मडगुळं सोन्याचं कडबुळं रुप्याचा वाळा तान्ह्या बाळा… ‘

मग चाल चाल वाटे करून पांगुळगाडा आणला जातो. बाळ आईबापांची ओळख धरते. टाळू भरतो,

‘टाळ्या टाळ्या लेमन च्या गोळ्या ‘

दंतावळीचे आगमन होते… जिव्हाळी वळवळू लागते…

बोबडे बोल बोलू लागते. गालावर खळी शोभू लागते. डोळ्यात काजळ,

केसांची गुंतवण

कानात बाळी शोभू लागते…

आता हा दुसरा परिच्छेद…

” पावसाळ्यातल्या दाटलेल्या मेघमाळा, खळखळाट करून वाहणारे ओहोळ, डोंगराळ प्रदेशात दाटलेले मळभ, भरलेले आभाळ, ढगाळ वातावरण, गवताळ जमिनीवर हरळी, गवत खाऊन भरलेले वळू. शेतमळ्यात ढेकुळ फोडत नांगरणारे घाम गाळणारे, राबणारे मळेकरी, कुळवाड्यांची कोळपणी, विरळणी आणि शेतातली कामे, जोंधळ्याची खळ्यात पडलेली रास, नांगरांचे फाळ, शेतात चालणारे विळे, जळाने उचंबळून खळखळून वाहाणारे ओहोळ, भरलेली तळी, त्यात उमलणारी कमळे, भुईकमळे, कर्दळीचे रान, गोशाळेत गाईंच्या आचाळांना पिणारी वासरे, मायंदाळ झालेली फळप्राप्ती…

हिवाळ्यात थंडगार, झुळझुळत वाहणारे वारे देहावर शिळक उमटवतात, हळूहळू वातावरण बदलते, आंब्याच्या डहाळीला मोहर फुलतो, थंडीत पांघरलेली वाकळ फडताळात जाते आणि दिवस पळू लागतात, उन्हाच्या झळांना सुरुवात होते, मुंगळे जळ धुंडाळताना ओळ लावून धावताना नजरेस पडतात, फाल्गुनात होळीच्या ज्वाळा पेटतात आणि उन्हाळा अजूनच तीव्र होतो, अचानक आभाळात मेघमळा धावू लागतात, यालाच आपण वळीव, अवकाळी पावसाळा म्हणतो. वैशाखाच्या उन्हात वाळवणे साधली जातात.

ळ ने आपले जग असे व्यापले आहे…

अगदी आपल्या देहापासूनच सुरुवात करू

आपलं टाळकं, अनेक टाळकी, तोंडावळा, मोकळी वेणी, केसांची गुंतवळ,

कानाची पाळी, कानातला मळ, अंगातले बळ,

कपाळ, भाळ, कपाळावर मळवट,

गालाची खळी,

नाक चाफेकळी,

तोंडात जिभाळी, पांढरी शुभ्र दंतावळ, लाळ, चुळ, आरोळी,

गळा, गळ्यातला माळा, हातात असलेल्या कोपरखळ्या, तळवट, तळहात, मळहात,

बोटातली नम्र करंगळी, हाताची ओंजळ,

पायाचा तळवा,

पोटातला कोथळा,

दोन दोन डोळे, त्यावर चाळशी, डोळे नसतील तर आंधळे किंवा असून रातांधळे,

मुखकमळ, त्यातला मंजुळ आवाज, कधी कधी माणसाला आलेली मुखदुर्बळता, मुखातली कवळी,

पुरुषांचा मिशाळ, दाढीचा केसाळ चेहरा,

बोलातली मधाळता, अति झाली तर लाळघोटेपणा,

रोजची अंघोळ,

शरीराचा हाडकूळेपणा (हाडकपाळ्या) अथवा ढोबळेपणा,

हातापायांचे मुरगळणे असो किंवा लुळेपण,

अंगातली कळ, उन्हाळ्यात उठणारे घामोळे, उठणारी पुळी, चामखीळ, जखमांचे किंवा घटनांचे चिघळणे, गंडमाळा, मुळव्याध, रक्तबंबाळ होणे, रक्ताची गुठळी,

लेकुरवाळेपण, मुलेबाळे, मुलीबाळी, वंशावळ वाढणे,

जीवनाच्या शेवटीचे काळ येणे, काळ होणे…

एवढेच नव्हे तर पुढे हळहळ,

ती झाली की

मृत्यूनंतर भूतावळ, हडळ, आणि भुतांचा राजा वेताळ पण…

😃

रंगात बघा… काळा, पिवळा, निळा, जांभळा, ढवळा, पवळा, गव्हाळ, चुनकळी, दुधाळ, हिरवानिळा पण…

कीटकांमध्ये मुंगळे, डोंगळे, झुरळ, पेंगुळ, टोळ, हरणटोळ, जळवा आळ्या…

फुलांमध्ये कमळ, कर्दळी, भुईकमळ, ब्रह्मकमळ… पक्षांमध्ये कावळा, बगळा, कोकीळ, डोमकावळा,

वेगळे असे वटवाघुळ,

फळांमध्ये आवळा, केळी, राजकेळी, कोहळा, जांभूळ, डाळिंब, आळू, ताडगोळे, नारळ अर्थात श्रीफळ…

मिसळण्याच्या डब्यात हळद, तीळ,

मसाल्यात जायफळ, मायफळ, कारळे, काळेमिरे, काळेतिळ, पांढरे तिळ

पालेभाज्यात तांदळी, अळू, मायाळू, चिघळ, घोळ, टाकळा,

फळभाज्यात भोपळा, दुधीभोपळा, पडवळ, रताळं, मुळा

तेलात नारळाचे, कारळयाचे, तिळाचे तेल

धान्यात तांदूळ, जोंधळे

कडधान्यात कुळीथ, विविध डाळी,

गोडात गुळ

मांसाहारात कोळंबी, खाद्यपदार्थ आंबोळी, गुळांबा, विविध उसळी, कडबोळे, भाताचे ढिकळ, गोळ्या, तिळगुळ, रायवळ आंबे, पोळ्या

स्वयंपाक घरातल्या वस्तूंमध्ये मुसळ, उखळ, ओगराळे, घंगाळ, चाळण, थाळी, थाळा, नरसाळे, विळी

ज्वलनात कोळसा

घरातल्या इतर वस्तूंमध्ये खेळ, खुंटाळी,

शाळेत गेलो तर फळा, धूळपाटी, वर्गमूळ, घनमूळ, अर्धवर्तुळ, पूर्ण वर्तुळ, वर्तुळखंड शाईतल्या हिंगुळात पण ळ आहेच

अंकामध्ये 39 ते 48 यामध्ये ळ येतोच

सणांमध्ये दिवाळी आणि व्रतांमध्ये मंगळागौरी

वारात मंगळवार

तर ग्रहात मंगळ

अगदी पाताळात, भूतळात, भूमंडळात, आभाळात, अंतराळात, तारामंडळात पण ळ आहेच

पृथ्वीला निळावंती म्हटले जाते तसेच पुष्कळा ही म्हटले जाते

व्यवसायात माळी, साळी, गवळी, गोंधळी या शब्दात ळ येतोच.

क्रमशः…

©  श्री श्रीनिवास गोडसे

इचलकरंजी, मो – 9850434741

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ५४ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ५४ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र – आता प्रतीक्षा होती ती फक्त तिकडून येणाऱ्या फोनची!.. आणि त्यादिवशी फोनचा रिंगटोन वाजताच तिकडचाच फोन असणार ही खात्री असल्यासारखा मी फोनकडे धावलो…

 फोन तिकडचाच होता… !

 “मामाs.. मी अजित बोलतोय.. “

 त्याच्या उत्तेजित झालेल्या स्वरांनी माझा थरकाप उडाला. त्याच्या आवाजातली थरथर मला स्पष्ट जाणवली आणि मी थिजून गेलो… त्याला ‘बोल’ म्हणायचं भानही हरवून बसलो. माझ्या थरथरणाऱ्या हातातला रिसिव्हर कसाबसा सावरत मी तसाच उभा होतो…. !)

 ” कुणाचा हो फोन?” बाहेर येत आरतीने विचारले.

 “अजितचा.. ” मी कसंबसं एवढंच बोललो.

 ” हॅलो.. , मामाच ना… ? “अजितने अधिरतेने विचारलं.

 ” हो अजित… बोल. ” अखेर मी मन घट्ट केलं…

 ” मामा, एक खूsप आनंदाची बातमी आहे… “

 माझा माझ्या कानांवर विश्वासच बसेना. दुःख आणि वेदनांशी सर्व पातळ्यांवर सतत प्रतिकार करीत थकून गेलेल्या माझ्या ताईच्या घरून आलेल्या फोनवर आनंदाची बातमी? किती विचित्र आणि तरीही हवासा वाटणारा विरोधाभास होता हा.. ! आता मात्र मला धीर धरवेना…

 “आनंदाची बातमी.. ? काय रे.. ?”.. माझी उत्सुकता शिगेला पोचली.

 “ओळख बघू. तू ओळखूच शकणार नाहीस.. ” अजित म्हणाला. मला कांंही सुचेचना. तरीपण बातमी कांहीही असली तरी ती ताईच्या आजारपणाशीच संबंधित असणार ही खूणगांठ मनात होतीच.

 “ताईची तब्येत सुधारतेय.. हो ना?.. तिचं ऑपरेशन करायची गरज राहिलेली नाही असं म्हणालेत ना डॉक्टर.. ?” मी उत्सुकतेने विचारलं. कारण यापेक्षा ताईच्या घरून आलेली दुसरी कुठलीच बातमी माझ्यासाठी अधिक आनंदाची असूच शकणार नव्हती.

 “नाही रे… ” अजितचा आवाज पडला. “कालच्या चेकपचे रिपोर्टस् आलेत. ते फारसे एन्करेजींग नाहीयेत अरे. ऑपरेशन करावंच लागणाराय. पण आई खूपच अशक्त झालीय. तिच्या अंगातलं रक्तही खूप कमी झालंय. त्यासाठी महिनाभराची औषधं लिहून दिलीयत. मग पुन्हा चेकअप होऊन ऑपरेशनची तारीख ठरणाराय.. “

 आता यापुढं आणखी काही ऐकायची माझी इच्छाच मरून गेली. आरती समोरच बसली होती.

 ” अहोs, काय झालं? गप्प कां आहात तुम्ही? बोला नाs त्याच्याशी… “

 ” नको.. ” माझा आवाज भरून आला. “.. घे.. तूच बोल.. “मी कसंबसं बोललो न् रिसिव्हर तिच्या हातात दिला. एखाद्या मूक साक्षीदारासारखा तिच्यासमोर बसून राहिलो.

 “अजित, बोल रे.. मी मामी बोलतेय. ” आरती म्हणाली. त्यानंतर एक दोन क्षणच गेले असतील आणि…

 “काय सांगतोयस काय.. ?” आरतीने उत्तेजित स्वरांत विचारलं आणि पुढे दोघं बराच वेळ बोलत राहिले. आश्चर्य आणि आनंदाने चिंब भिजलेली तिची अवस्था पाहून मला पटकन् समजेचना काय झालंय? बोलणं संपताच तिने रिसिव्हर ठेवून दिला तरी ती अजून त्याच आनंदात तरंगत होती!

 ” काय गं? काय म्हणत होता अजित? कसली आनंदाची बातमी? “

 ” अहो, ताईंना महाराष्ट्र राज्य लाॅटरीचं पाच लाख रूपयांचं बक्षिस लागलंय. “

 हे अनपेक्षितच होतं.

 ” काsय.. ?”माझा विश्वासच बसेना. हे शक्यच नव्हतं. ताई आणि लॉटरी? कसं शक्य आहे हे? अतिशय स्वाभिमानानं जगणारी माझी ताई कोणत्याही प्रश्नाचं असं सोपं, सोईचं उत्तर शोधणं शक्य तरी आहे कां? सरळ, साधं आयुष्य जगण्यात आनंद मानणारी माझी ताई लॉटरीचं तिकीट काढेलच कशाला? माझ्या मनातली ही लगेचची प्रतिक्रिया मनातच विरून गेली आणि क्षणकाळ बधीर होऊन गेलेलं माझं मन थोडं हलू बोलू लागलं. त्या मनात अनेक प्रश्नांची गर्दी झालेली होती. आजवर पैशाकडेच पैसा जातो हेच ऐकलेलं.. पाहिलेलं. पण इथं नेमक्या निकडीच्या वेळीच तो गरजवंताकडे गेलाच कसा? आणि तोही नेमक्या हव्या त्या क्षणी आणि अशा राजमार्गाने? हे खरं म्हणावं तर लॉटरीचं तिकीट कुणी, कधी आणि कां काढलं असेल? केशवरांच्याकडे रिटायरमेंटनंतर आलेले साडेतीन लाख रुपये होते, शिवाय तशीच वेळ आली तर आम्ही सर्वजण खर्च करायला तयार होतो, मग लॉटरीचं तिकीट काढण्याइतकी हतबलता तिला कां जाणवली असेल?…

 प्रश्न अनेक होते. पण.. सगळेच अनुत्तरीत.. !

 खूप लहानपणी कधीकाळी वाचलेली लाकूडतोड्याची गोष्ट मला आठवली. आम्ही सर्वांनी मदतीच्या रूपाने देऊ केलेले पैसे, आपले नव्हेत म्हणून ताईने आणि काकांनी नम्रपणे नाकारलेले होते. म्हणूनच कां या पाच लाखाच्या बक्षिसाच्या रूपातल्या सोन्या-चांदीच्या कु-हाडी त्यांना अशा प्राप्त झाल्या? कसाही विचार केला तरी या घटनेमागचा समाधानकारक असा कार्यकारणभाव माझ्या लक्षातच येईना.

 हे सगळं कसं घडलं याचा शोध घेताना मन थकून गेलं. ‘योगायोग’ हे एकच सोयीचं पण घासून गुळगुळीत झालेलं उत्तर माझ्या मनाचं समाधान करेना.

 “ताईंची इच्छाशक्ती जबरदस्तच म्हणायची” आरती एक दिवस सहज म्हणाली आणि माझ्या विचारांना योग्य दिशा मिळाली. पण त्या दिशेने भरपूर पायपीट करूनसुद्धा समाधानकारक उत्तर सापडेचना. ताईशी मोकळेपणाने बोललो तर सगळंच नीट समजेल असं वाटलं खरं, पण पुढच्या सगळ्याच भेटी नंतर दवाखान्यात ताई निकरानं मृत्यूशी झुंज देत असतानाच्याच. तिथे तिला कांही विचारणं, बोलणं शक्यच नव्हतं. तिथे फक्त समोर उभं राहून तिचं एकाकी लढणं आम्ही ति-हाईतासारखं पहात होतो! त्या पहाण्यातला प्रत्येक क्षण न् क्षण मला हतबल करणारा, माझा पराभव करणाराच होता!

… आणि एक दिवस… मलाच शह दिल्यासारखी ताई गेली! ऑपरेशन यशस्वी होऊनही नंतर जवळजवळ महिनाभर आतल्याआत जळत आणि तळमळत अखेर ती गेलीच!!

 ती गेली ते असं चटका लावून, मला नको इतकं हळवं करून आणि कधी नव्हे ते मनाला अस्वस्थ करणारे असंख्य प्रश्न माझ्या मनात निर्माण करून!!

 ती गेल्यानंतर पूर्णपणे उध्वस्त झालेले केशवराव म्हणाले होते, “अखेर ती माझं काही न घेताच, मला मात्र जाताना खूप कांही भरभरून देऊन गेलीय. “

 तिच्या साऱ्या यातनांची, तिच्या मनाच्या तळात सुरू असणाऱ्या उलघालीची केशवरावांइतकीच माझी आईसुद्धा एक महत्त्वपूर्ण साक्षीदार होतीच. आणि तिचं तिथं असणंच माझ्या मनात निर्माण झालेल्या अनेक अनुत्तरीत प्रश्नांची समाधानकारक उत्तरं शोधण्यास मला माझ्याही नकळत सहाय्यभूत ठरणार आहे याची पुसटशीही शक्यता त्याक्षणी मात्र मला जाणवलेली नव्हती एवढं खरं!

 (क्रमशः – दर गुरुवारी)

 ————————

©️ अरविंद लिमये, सांगली

 (९८२४७३८२८८)

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भ्रष्टाचाराचे भवितव्य…… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? विविधा ?

भ्रष्टाचाराचे भवितव्य… ☆ श्री सुनील देशपांडे 

आपल्या देशाने लोकशाही व्यवस्थेचा आदर्श म्हणून स्वीकार केला परंतु प्रशासन ही लोकशाहीची शोषण यंत्रणा ठरली हे सुद्धा नाकबूल करून चालणार नाही. एके काळचे स्वतः पंतप्रधान जेव्हा सांगतात की एक रुपयांपैकी ८५ पैसे यंत्रणेमध्ये गायब होतात आणि प्रत्यक्ष लाभार्थीपर्यंत १५ पैसे पोहोचतात. याचा अर्थ प्रशासन यंत्रणा ही ८५% भ्रष्टाचारी आहे आणि शोषक आहे. प्रशासन यंत्रणेवर एवढा मोठा आरोप करून सुद्धा इतकी वर्ष होऊनही त्या आरोपाचे खंडन सुद्धा प्रशासन यंत्रणेतील कोणीही अजून पर्यंत केले नाही. भ्रष्टाचाराची सुरुवात ही प्रशासन यंत्रणेपासून झाली. कारण ब्रिटिशांच्या काळात मूठभर ब्रिटिशांना एवढ्या मोठ्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवून राज्य करण्यासाठी प्रशासन यंत्रणेला भ्रष्टाचाराचे स्वातंत्र्य देणे हे गरजेचे होते. प्रशासन यंत्रणा ही राज्यकर्त्यांची बटीक झाली ही फक्त पगारामुळे नव्हे, तर त्यांना मिळालेल्या भ्रष्टाचाराच्या स्वातंत्र्यामुळे झाली. राज्यकर्त्यांपुढे लाचार होण्याचे भ्रष्टाचार हे सर्वात प्रमुख कारण होते. या प्रशासन यंत्रणेच्या भ्रष्टाचार स्वातंत्र्यामुळेच ब्रिटिशांना एवढ्या मोठ्या लोकसंख्येवर एकतंत्री राज्य करणे शक्य झाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही प्रशासन यंत्रणा ब्रिटिश कालीन प्रशासन यंत्रणेप्रमाणे जशीच्या तशी चालू राहिली. त्यावर अंकुश ठेवणे राजकीय सत्ताधाऱ्यांना संपूर्णपणे कधी जमलेच नाही. उलट पक्षी त्या प्रशासन यंत्रणेनेच स्वतःच्या सोयीसाठी हळूहळू राजकीय सत्ताधाऱ्यांनाच भ्रष्टाचारी जगामध्ये ओढून घेतले.

 आता जर राज्यकर्त्यांना खरोखरच काही करायचं असेल तर त्यांना दुसऱ्या एखाद्या अभिनव पद्धतीने प्रयत्न करून बघावे लागतील. त्याचेही भले बुरे परिणाम कालांतराने दिसतीलच. त्यानंतर नवीन काही प्रयोग होतीलच.

नव्हे त्यांना ते तसे करावेच लागतील.

मला अजून आठवते ज्यावेळी मा. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले होते त्यावेळी एक व्यंगचित्र आले होते. एक व्यक्ती त्यांना म्हणते आता तुम्ही पंतप्रधान झाले आहात तर सर्व भ्रष्टाचा-यांना दूर करा.

त्यावर ते असे उत्तर देतात ‘ If I have to remove all corrupt persons, then, one man cannot run the government’

व्यंगचित्रकाराने अगदी वर्मावरच बोट ठेवले होते.

मी जर भ्रष्टाचारा विरोधात कारवाई करायची असेल तर काही दिवस माझ्या कार्यालयात सुद्धा भ्रष्टाचारी असतील तरी त्यांचे बद्दल लगेच कारवाई करता येणार नाही. तशी केली तर माझ्या कार्यालयामध्ये स्टाफच राहणार नाही. जर मी माझ्या पक्षातल्या लोकांवर प्रथम कारवाई करायची ठरवली तर माझे पद व अधिकार सुद्धा राहणार नाही.

शुद्धीकरणाची सुरुवात आता दूर वरून बाहेरून आत मध्ये करण्याची गरज आहे. आपल्याशी संबंध नसलेल्या दूरच्या लोकांच्यावर आणि विरोधी पक्षांवर कारवाई प्रथम सुरू करणे हाच पर्याय शिल्लक उरतो. फक्त एवढेच व्हावे की विनाकारण चांगल्या व्यक्तींना त्रास होऊ नये. जे खरोखर भ्रष्टाचारी आहेत त्यांचे वरच कार्यवाही व्हावी. भ्रष्टाचार विरोधात कार्यवाही धडाक्याने चालू आहे हे पाहिल्यानंतर एखाद्या वेळेस स्व पक्षातले किंवा जवळचे लोक सुद्धा त्या भीतीने भ्रष्टाचारामधून मुक्त झाल्यास उत्तमच. बाहेरची कार्यवाही हळूहळू पूर्ण झाल्यास, सगळ्यात शेवटी स्वतःच्या जवळच्या लोकांच्यावर कार्यवाही सुरू करता येईल.

अशा तऱ्हेचा एक नवीन पॅटर्न जर राबवता आला तर तो यशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे. स्वतःच्या पक्षात सामावून घेतलेले भ्रष्टाचारी लोक सुद्धा आत्ताच्या वॉशिंग मशीन मुळे नाही पण नंतरच्या ब्रेन वॉशिंगमुळे भ्रष्टाचारापासून दूर राहतील असा एक प्रयोग जर करत असतील तर काही हरकत नाही.

आत्तापर्यंतच्या परंपरेने जे काही चालले आहे त्याच्या पेक्षा वेगळ्या पद्धतीने पण सकारात्मक परिणाम घडण्याची शक्यता असेल तर एक नवा प्रयोगही करून पाहायला हरकत नाही. फक्त अशा कारवाया करताना विरोधी पक्षाचे असले तरीसुद्धा त्यापैकी खरोखरच भ्रष्ट असतील त्यांच्यावरच कार्यवाही व्हावी. विनाकारण विरोधातले म्हणून बदनामीसाठी त्यांच्यावर कार्यवाही होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसे झाल्यास उत्तमच. परंतु ती कार्यवाही न्याय यंत्रणे मार्फत व कायदेशीर मार्गानेच होणे आवश्यक असल्याने त्याला कालावधी प्रचंड मोठा लागणार आहे. ही त्यातली अडचणीची बाब ठरू शकेल. पण ठीक आहे देर आये दुरुस्त आये. सध्या बहुता तसेच घडते आहे. कारवाईची सुरुवात जोर जोरात गाजावाजा करून होते आहे. एकदा ती न्याय यंत्रणेच्या चक्रामध्ये अडकवून टाकली की मग शांतता कोर्ट चालू आहे! ती केस केव्हा निकाली निघू शकेल हे कोणी सांगू शकेल काय?

सध्या तरी अनेक प्रकाराने यंत्रणेमध्ये बदल करून भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्याचे छोटेखानी प्रयत्न चालू आहेत. लोकांच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा करणे. ऑनलाइन पद्धतीने काही गोष्टी केल्याने सरकारी कार्यालयात हेलपाटे घालण्याची गरज भासू नये. जास्तीत जास्त व्यवहार ऑनलाइन पद्धतीने होतील असे पाहणे. यातूनही खूप फरक पडतो आहे, पडला आहे.

काही बाबतीत सरकारी यंत्रणांची काही कामे खाजगी यंत्रणांकडे दिल्यास जो पैसा भ्रष्टाचारामधून काळ्याधना मध्ये जात होता, तो अधिकृतपणे खाजगी यंत्रणांना मिळाल्यास काय हरकत? लोकांचीही सोय आणि ती सोय झाल्यामुळे त्यांची चार पैसे खर्च करण्याची तयारी याचा सुवर्णमध्य निघेल. सध्या अशी यंत्रणा पासपोर्टच्या संबंधात वापरली जात आहे ती यशस्वीही होत आहे असे दिसते.

अशा वेगवेगळ्या मध्यस्थ सेवा निर्माण केल्यास लोकांचीही सोय होईल आणि रोजगाराचीही निर्मिती होईल. अनेक सरकारी यंत्रणांमध्ये आता ऑनलाईन अर्ज विनंती ही पद्धत सुरू झाली आहे. परंतु सर्वसामान्यांच्या अंगवळणी ही ऑनलाईन पद्धती पडत नाही. अशावेळी तरुणांसाठी अशा सेवांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती निर्माण करता येईल. सध्या रेल्वे, विमान इत्यादी आरक्षण सेवा अशा पद्धतीने दिल्या जात आहेत. ही चांगली गोष्ट आहे आणि जनतेच्या उपयोगाची सुद्धा आहे. जुन्या पद्धतीने सरकारी ऑफिसमध्ये खेटे घालून कंटाळून शेवटी नाईलाजाने खुर्चीवरील बाबूला पन्नास शंभर रुपये देऊन काम करून घेत असत. त्याऐवजी आता झालेले ऑनलाईन कामाचे प्रकार याबाबत सेवा देणाऱ्या बेरोजगार तरुणांना पन्नास शंभर रुपये सेवा शुल्क त्यांचे कडून ऑनलाइन सेवा उपलब्ध करून घेणे हे जास्त योग्य होईल. अशाप्रकारे

सामान्य जनतेची क्रयशक्ती जेवढी असेल त्यातून विविध सेवा उद्योगांना जास्त कामाची संधी मिळेल. त्यामुळे सामान्यजनांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढवणे आणि त्यांची क्रयशक्ती वाढवणे यावर भर दिला जाणे ही गरजेची गोष्ट झाली आहे. त्या दृष्टीने सरकार वेगवेगळ्या योजना राबवून सामान्य माणसाच्या हातात पैसा खेळता ठेवण्याची योजना राबवत आहे का ? पण त्याचवेळी ऐतखाऊ लोकांची संख्या वाढली तर ही गोष्ट सुद्धा राष्ट्राच्या दृष्टीने धोकादायक आणि नुकसानीची ठरेल. त्यामुळे अशा योजना या फक्त मर्यादित कालावधीसाठी किंवा वेगळ्या पद्धतीने परंतु त्यामधील धोके टाळून राबवता येणे शक्य आहे काय याचाही विचार करून अत्यंत कौशल्याने योजनांची निश्चिती करणे आवश्यक ठरेल.

उद्योग व्यवसायामध्ये सरकारी यंत्रणांची लुडबुड कमी करणे. कर प्रणालीचे सुलभीकरण. अनावश्यक गोष्टींना फाटा देऊन सरकारी कामकाजाचे सुलभीकरण. अशा विविध गोष्टी करण्याचा हळूहळू प्रयत्न चालू आहे असे दिसते.

या सर्व प्रयत्नांचे योग्य ते परिणाम कालांतराने दिसतीलच कारण हे परिणाम झपाट्याने होत नसतात, परंतु त्यासाठी एका गोष्टीची मात्र आवश्यकता आहे. सरकार जरी बदलले पक्ष जरी बदलले तरी हे बदल पुन्हा उलट्या दिशेने फिरवण्याचा प्रयत्न झाल्यास पुन्हा परिणाम शून्य.

अर्थात भविष्यावर नजर ठेवून वाट पाहणे, याशिवाय आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या नशिबात दुसरे काय आहे?

© श्री सुनील देशपांडे

पुणे, मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रागावलेले पक्षी… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ रागावलेले पक्षी…  ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

लहानपणी पासून म्हणजे अगदी बाळ असल्यापासून आपले भावविश्व व परिचय होतो तो काऊ चिऊ यांच्याशी जोडलेले असते. अगदी एक घास काऊचा एक घास चिऊचा अशी सुरुवात होते. इथे इथे बस रे काऊ असे म्हणत काऊला हातावर बसण्यासाठी बोलावले जाते. आणि हे सगळे पशू पक्षी आपल्या आयुष्यात किती आवश्यक असतात हे मनावर ठसते. आणि मग या कावळ्याचा आपल्या आयुष्यात किती जवळचा व घनिष्ट वावर असतो ते लक्षात आले. या काऊचे बरेच प्रसंग अनुभवले आहेत. आणि त्यांच्या रागाचा तर चांगलाच प्रसाद मिळाला आहे.

आम्ही आमच्या नवीन घरात रहायला आल्यावर निसर्गरम्य परिसर, इकडे तिकडे फिरणारे विविध पक्षी यांचे फारच आकर्षण होते. आणि त्याचा किलबिलाट ऐकून खूप आनंद व्हायचा. मी हातावर धान्य घेऊन त्यांना भरवत असे. आणि त्याची चिमणी आणि इतर छोट्या पक्षांना चांगलीच सवय झाली होती. शनिवारी मात्र सकाळच्या शाळेमुळे हे शक्य व्हायचे नाही. आणि ते पक्षी सर्व प्रकारचा आरडा ओरडा करायचे. एका शनिवारी आमच्या ह्यांना वाटले आपण धान्य द्यावे. म्हणून ते हातावर धान्य घेऊन उभे राहिले, तर ते धान्य पक्ष्यांनी स्वीकारले नाही. उलट त्यांच्या हातावर चोची मारुन गेले.

एकदा आम्ही एका शेतातल्या घरी(फार्म हाऊस) वर गेलो होतो. आम्ही व्हरांड्यात बसलो होतो त्याच्या समोर एक झाड होते. त्यावर एक कावळा सतत येऊन ओरडायचा. आम्ही त्याच्याकडे इतके लक्ष दिले नाही. मग आम्ही फोटो काढण्यासाठी त्या झाडाजवळ गेलो. त्या वेळी तो कावळा जास्तच ओरडू लागला. पुन्हा आमच्या जागेवर जाऊन बसलो. नंतर तर तो इतक्या मोठ्या आवाजात चिडून आमच्या कडे बघून ओरडू लागला. थोड्या वेळाने तर तो स्वतःची पिसे उपटू लागला. थोडी चौकशी केल्यावर कळले, आम्ही बसलो होतो तेथे त्याच्यासाठी रोज धान्य व पाणी ठेवले जात होते. आम्ही तिथे बसल्यामुळे त्याच्यासाठी धान्य व पाणी दुसरीकडे ठेवले होते. ते त्याने अजिबात घेतले नव्हते.

आमच्या घरासमोर आम्ही अशोकाची झाडे लावली आहेत. त्यावर दरवर्षी अगदी शेंड्यावर कावळा घरटे बनवतो. त्यात कोकिळ पण आपले एखादे अंडे घालते. दोघांची अंडी उबवली जातात. कावळ्याची पिल्ले लवकर उडायला शिकतात. आणि त्या कोकिळेच्या पिल्लाला वाढवत असताना, उडायला शिकवत असताना, कावळा आमच्या डोक्यावर चोचीने मारतो आणि आम्हाला घरात जायची बंदी करुन टाकतो. आपण त्या पिल्लाकडे(कोकिळेच्या) पाहिले तरी अंगावर चाल करून येतो.

अशा विविध पक्ष्यांच्या व प्राण्यांच्या रागाचे, खोडकर पणाचे व त्यांच्या आनंदाचे अनुभव घेतले आहेत. आणि या भावना त्यांच्यात पण असतात फक्त ते त्यांच्या पद्धतीने व्यक्त करत असतात. ते आपण ओळखू शकलो तर आपल्याला पण खूप छान वाटते. आणि ही विविधता आनंद देते.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वयाने तरुण व विचारांनी म्हातारा भारत… ☆ श्री हेमंत तांबे ☆

श्री हेमंत तांबे 

🔅 विविधा 🔅

☆ वयाने तरुण व विचारांनी म्हातारा भारत… ☆ श्री हेमंत तांबे 

🌹 *वयानं तरुण व विचारांनी म्हातारा भारत हे चित्र आपण बदलू शकतो 🌹

🌷 गोष्ट अशी आहे, चीनमध्ये एक कृतिशील विचारवंत लाओत्से ऐंशी वर्षांचा म्हाताराच जन्माला आला. डोक्याचे केस चक्क पिकलेले आणि चेहऱ्यावर सुरकुत्या ! हा लाओत्से म्हणजे आपल्या कडील बुध्द म्हणू शकता ! पण लाओत्सेचे विचार आजही मार्गदर्शक आहेत !! तरूण आहेत !!! त्याच्या जन्माची गोष्ट अविश्वसनीय आहे, कोणीही विश्वास ठेवणार नाही, माझाही नाही……. पण आपण प्रतिकात्मक रित्या असा विचार करू शकतो……… कारण भारतीयांची मानसिकता तपासली तर या चीनी गोष्टीवर विश्वास ठेवावा लागतो.

🌷 बहुतांश भारतीय म्हातारेच जन्माला येतात, मी वयानं म्हणत नाही, तर दृष्टीनं विचारानं आचारानं ! माणसाचं शरीर जवान मर्द असू शकतं, पण मन भूतकाळात रमुन म्हातारं झालेलं असू शकतं !

🌷 आपल्याला सर्वत्र तरुण दृष्टिस पडतील, पण तरुणाईसाठी मुलभूत गोष्टींची वानवा तुम्हाला दिसेल. मी युवक त्यालाच म्हणेन ज्याची ओढ भविष्याकडे असेल. Young is that one, who is future oriented and old is that one who is past orinted ! कोणत्याही वयस्कर व्यक्तीला भेटा, तो भूतकाळातील आठवणीत रमलेला दिसेल. तो पुढे म्हणजे भविष्यात पाहणार नाही, कारण त्याला मृत्यू दिसत असतो. जवान मात्र भविष्यात पाहील, कारण त्याला मृत्युची भिती नसते, काही अदम्य करण्याची इच्छा असते ! आपण रशिया, अमेरिका किंवा इतर प्रगत राष्ट्रांतील युवक पाहा. ते अंतरिक्षात यात्रा करण्याची इच्छा ठेवतात. आकाशाला गवसणी घालण्याची इच्छा बाळगून आहेत आणि भारतीय तरुण पहा भविष्याची कोणती कल्पना, योजना, Utopia नाही….. गेल्या दहा वर्षात चित्र बदलू लागलंय मात्र तरुणांची संख्या आणि त्यांची भविष्या बाबत वास्तव स्वप्नं यांचं प्रमाण अत्यंत व्यस्त आहे ! आपण भविष्यासाठी जगतो, भविष्यासाठी स्वप्नं रंगवतो….. पण जर भविष्यासाठी स्वप्न नसेल तर भविष्य अंधकारमय आहे, निश्चित समजा !

🌷 आपण भुतकाळात फार रमतो, भुतकाळ संपन्न होता हे सांगणारी पुस्तकं वाचतो, भुतकाळातील हिरो आपले आदर्श असतात. थोडक्यात आपला इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहावा इतका सुंदर होता, या आठवणीतच रममाण आपण असतो. आणि यात अयोग्य काहीच नाही……… पण त्यातील समृद्ध वारशाची चर्चाच करायची, की तो अंगिकारून पुढं जायचं ? यावर आपण गप्प असतो !

🌷 लक्षात घ्या. आपण कार चालवत आहात, कारला तीन आरसे पाठी दिसायला असतात. आता जर कार पुढं न्यायची असेल, तर तुम्ही पूर्णवेळ आरशात पाहू शकत नाही, त्यानं अपघात होईल ! भुतकाळात झालेल्या चुका पाहायच्या व त्या पुन्हा होऊ नये म्हणून बोध घेऊन पुढंच जायचं, त्या चुकांचा कोळसा उगाळत बसलात तर हात काळे होतील !….. भारताचा दोन हजार वर्षांचा इतिहास असा पाठी पाहून पुढं चालण्याचा आहे, म्हणून अपघात जास्त झाले. गेल्या दोन हजार वर्षांत आपण अनेक खड्ड्यात पडलो. यशाची उत्तुंग शिखरं आपण पादाक्रांत केली नाहीत ! गुलामी, गरिबी, हीनता, कुरुपता, दिनता, अस्वस्थता पाहिली आहे !….. आजही आपल्यातील अत्यल्प तरुण भविष्यातील उत्तुंग शिखरं चढण्याची आकांक्षा बाळगतात….. मी भुतकाळ व भविष्या बद्दल फार लिहित नाही, पण एक धारणा आपण मनाशी पक्की केली आहे……… सत्ययुग होऊन गेलंय आता कलियुग आहे, कोणतीही चांगली गोष्ट घडू शकणार नाही !…. *ही महामुर्खांची मानसिकता आहे !!*

🌷 राम, कृष्ण, नानक, महावीर, बुध्द, कबिर, छ शिवाजी, म राणा जे चांगले होते ते होऊन गेले, आता होणार नाहीत. पण लक्षात ठेवा, जोपर्यंत आपण भविष्यात चांगले महानुभाव तयार करत नाही, तोपर्यंत भुतकाळात असे महानुभाव होऊन गेले हे पटवून देणं कठीण जाईल. जोपर्यंत आपण भविष्यात नवनवीन श्रेष्ठता निर्माण करू शकत नाही, तोपर्यंत भुतकाळातील श्रेष्ठता काल्पनिकच वाटणार कारण, आपली चांगल्याच्या निर्मितीची परंपरा आपण खंडित केली !

🌷 जोपर्यंत आपण भविष्यातील कृष्ण राम तयार करत नाही, तोपर्यंत राम कृष्ण हे काल्पनिकच वाटणार….. कारण चांगला मुलगाच साक्ष देऊ शकतो, की माझा बाप चांगला होता ! जर आपण भविष्यात लाचार, दरिद्री, कंगाल, भिक्षांदेही असू तर कोणीही मान्य करणार नाही, भारतात सोन्याचा धूर निघत होता !………… आपण फक्त गुंड, बदमाश, चोर, लुटारू निर्माण केले तर छ शिवाजी, छ संभाजी, महाराणा प्रताप वगैरे विभुती इथं निर्माण झाल्या यावर कोण विश्वास ठेवील ? सद्यस्थितीतील तरुणाईनं दररोज नवनवीन प्रगतीची शिखरं काबिज केली नाहीत, तर आपण या महान विभुतींचे वारसदार आहोत, यावर कोण विश्वास ठेवील ?……. आपल्यातूनच जर बाबा आमटे, प्रकाश आमटे, विकास आमटे, अभय बंग, आंबेडकर, फुले, शाहू, धोंडो कर्वे, आगरकर, कर्मयोगी पाटील, विनोबा, स्वातंत्र्यवीर, विठ्ठल रामजी शिंदे, स्वामीनाथन, विलासराव साळुंखे वगैरे वगैरे कर्मयोगी तयार झाले, हे कशाच्या आधारावर आपण म्हणू शकतो ?

🌷 आज परिस्थिती बदलतेय, ध्येय धोरणं inclusive केली जात आहेत. विश्वगुरूची स्वप्नं आपल्याला दाखवली जाताहेत. प्रगतीचे मार्ग निष्कंटक केले जात आहेत, अशावेळी दूरदृष्टीनं भविष्याचा वेध घेऊन तरुणाईनं श्रेष्ठ ध्येयाप्रत पोचण्यासाठी सर्वस्व डावावर लावणं आवश्यक आहे ! टाचणी ते विमान निर्मितीसाठी आपण दुसऱ्यावर अवलंबून होतो….. आज परिस्थिती आमुलाग्र बदलली आहे, या बदललेल्या ecosystem चा फायदा जर तरुणांनी घेतला नाही, तर या तरुणांच्या ह्रासाला तरुणच जबाबदार आहेत, दुसरं कोणी नव्हे !

🌷 आज नाही तर उद्या संपूर्ण जग आपली खिल्ली उडवणार आहे, या जगद्गुरु विषयावरून….. जेव्हा कोणी म्हणेल मी श्रीमंत होतो, तेव्हा समजून जा तो गरीब आहे, जेव्हा कोणी म्हणेल मी ज्ञानी होतो, तेव्हा समजून जा, तो अज्ञानाच्या खाईत लोटला गेला आहे, जेव्हा कोणी म्हणेल आमची शान होती, तेव्हा समजून जायचं, ती शान आता मातीमोल झाली आहे !

🌷 भुतकाळात डोकावून पाहणं योग्य असलं, तरी भुतकाळ डोक्यात साठवणं धोकादायक आहे. कारण जगणं वर्तमानात असतं !

🌷 एका गोष्टीत आपण most productive आहोत आणि ती गोष्ट म्हणजे reproduction ! आपली लोकसंख्या आपण अमर्याद वाढवली. अमेरिकेला फक्त ४०० वर्षांचा इतिहास आहे आणि भारताला किमान १२–१५ हजार वर्षांचा इतिहास आहे. मग अमेरिका एवढी समृद्ध कशी झाली ? दुनियेतील अनेक देशांमध्ये भिकारी आहेत, पण एक पूर्ण देश भिकारी म्हणून १९७२ साली जगापुढे उभा कसा राहिला ?

🌷 मी युवा त्याला म्हणतो, जो भविष्याकडे उन्मुक्त आहे आणि वयस्कर म्हातारा म्हणजे ज्याला भुतकाळाप्रती प्रेम आहे, याला वयाचं बंधन नाही. आपण एक हजार वर्षे गुलाम होतो आणि केव्हाही परत गुलाम होऊ शकतो. म्हातारा मृत्यूला घाबरतो, तर जवान मृत्युला अंगावर घेतो. म्हातारा म्हणतो जे होतं ते माझ्या भाग्यात आहे, युवा किंवा जवान म्हणेल मी माझ्या मनगटाच्या जोरावर भाग्य लिहिन. म्हातारा म्हणतो जे होतंय ते देव करतोय, जवान म्हणेल मी जे करीन त्याला ईश्वरीय आशीर्वाद असेल. जवान संघर्ष तर म्हातारा अल्पसंतुष्ट……. ही अल्पसंतुष्टता आपण घालवली नाही, तर दुष्काळ, बेरोजगारी, महामारी, परावलंबित्व यांचीच पूजा आपण करत असतो ! यालाच म्हातारपण म्हणतात !!…… भविष्यासाठी योजना बनवा, अल्पसंतुष्टता सोडून द्या, एक निर्माणाची असंतोषकारी अभिप्सा आवश्यक आहे, एक सृजनाची आस पाहिजे…. *जेव्हा आपण दुःख, अज्ञान, रोगराई, दिनता, दरिद्रता, दास्यता संपवण्याची शपथ घेतो, तेव्हा भविष्य निर्मितीला सुरूवात होते !*
एक छोटीशी गोष्ट सांगून हे प्रबोधन थांबवतो.

🌷 एकदा जपान मध्ये एका छोट्या राज्यावर एका मोठ्या शत्रूनं आक्रमण केलं. ते सैन्य हद्दीवर येऊन उभं राहिलं… या छोट्या राजाचा सेनापती तरूण, साहसी, लढवय्या होता. तो जाऊन शत्रू सैन्य पाहून आला आणि राजाला म्हणाला महाराज, आपण या शत्रूशी लढून जिंकू शकत नाही, त्यांची खूप मोठी फौज आहे, आपले शिपाई कापले जातील व परत हरणं नशिबात येईल !… राजा सेनापतीला म्हणाला, तु तर जवान आहेस आणि असा म्हाताऱ्या सारखा वागतोस ?… आणि राजा नगरातील एका साधूकडे गेला आणि सर्व परिस्थिती सांगितली. अनेक वेळा राजा त्या साधूचा सल्ला घेत असे……. साधूनं राजाला सल्ला दिला, ताबडतोब त्या सेनापतीला तुरुंगात टाक. त्याची चुक झाल्येय. सेनापती मनानं हरलाय, त्यानं हार मानली आहे. आणि ज्यानं मनानं हार मानली, त्यानं प्रत्यक्षातील हार निश्चित केली !… मी युद्धासाठी निघत आहे!… राजानं सेनापतीला तुरुंगात टाकलं, पण विचार करत होता, या साधूला तर तलवार कशी धरायची हे सुध्दा माहीत नाही आणि हा युध्द कसं करणार ?

🌷 साधूनं तलवार घेतली व सर्व सैनिकांना आदेश देऊन युध्दावर निघाला. सैनिक साशंक होते. वाटेत एक देऊळ होतं. तिथं थांबून तो साधू सैनिकांना म्हणाला, मी देवाला विचारून येतो, युद्ध जिंकणार की नाही ?…. सैनिक म्हणतात, साधू महाराज, आपल्याला देवाची भाषा तर येत नाही….. साधू म्हणतो, मी हे नाणं देवाच्या पायावर ठेऊन वर उडवणार आहे. जर आपल्या राजाचा छाप वर आला, तर आपण युद्ध जिंकणार !…… आणि त्यानं तसं केलं. छाप वर आला…… साधूनं सांगितलं, आपण प्राणपणानं लढलो तर युद्ध जिंकणार आहोत, देवानं कौल दिला आहे !! आता आपण हरायचं असं ठरवलं तरी हरू शकत नाही, चला युद्ध सुरू करा, विजय आपलाच होणार आहे !!!

🌷 युध्द झालं. साधूची सेना प्राणपणानं लढली आणि जिंकली.

युध्दावरून परत येताना वाटेत ते देऊळ लागलं. साधू आपला नगराकडे निघालाय, सैनिक म्हणतात साधू महाराज, देवाचे आभार मानून पुढं जाऊया……..
साधू सांगतो, त्याची काहीच आवश्यकता नाही. नाण्याच्या दोन्ही बाजूला आपल्या राजाचाच शिक्का आहे !

🌷 ते सैनिक जिंकले होते, कारण विचार अंततः वस्तूत रुपांतरीत होतात. विचार घटना बनून जातात.

Sir Arthur Eddington – (Philosopher of science) says, “Things are thoughts and thoughts are things!

🌷 मी भारतीय मनाला युवा, तरूण, रसरशीत, उत्फुल्ल, कृतिशील पाहू इच्छितो. कारण आपण दोन हजार वर्षे म्हाताऱ्या सारखा विचार केला. हे भारतीय जनमानसातील म्हातारपण घालवलं पाहिजे ! विचार वय विसरायला लावतात, चांगला विचार करा, आचार सुधारेल, काम तयार आहे, आपल्या काम करणाऱ्या हातांची आवश्यकता आहे !

 🙏🌹शुभेच्छा ! 🌹🙏

© श्री हेमंत तांबे

पाटगाव. 

मो – 9403461688

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महाराष्ट्रातील संत स्त्रिया – भाग – ६ – संत बहिणाबाई…☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ महाराष्ट्रातील संत स्त्रिया – भाग – ६ – संत बहिणाबाई… ☆ सौ शालिनी जोशी

संत बहिणाबाईंचा जन्म वेरूळ जवळील देवगाव येथे. आई-वडील, जानकी व आवजी कुलकर्णी यांनी वयाच्या केवळ पाचव्या वर्षी पाठक आडनावाच्या एका तीस वर्षाच्या बिजवराशी बहिणाबाईंचा विवाह करून दिला. पण मुलीच्या लग्नासाठी काढलेले कर्ज आई-वडिलांना फेडणे शक्य झाले नाही. म्हणून जावयासह सारे कुटुंब घर सोडून प्रवासाला बाहेर पडले. पंढरपूर, शिंगणापूर करत कोल्हापूरला आले. एका ब्राह्मणांने त्यांना आश्रय दिला. बहिणाबाईंचे वय केवळ आठ वर्षाचे होते. पण त्यांना ईश्वराची अनावर ओढ होती. येथे जयरामस्वामी वडगावकरांची कीर्तने त्यांनी ऐकली. त्यातील तुकारामांच्या अभंगांनी त्या भारावल्या. सतत मुखात अभंग आणि तुकारामांचे ध्यान. ‘पती हाच परमेश्वर’ मानण्याचा तो काळ होता. बहिणाबाईच्या कर्मठ पतीला ते मानवले नाही. हात, पाय बांधून गोठ्यात टाकण्यापर्यंतच्या छळाला सामोरे जावे लागले. पण संसाराकडे तटस्थ भावनेने बघण्याचे सूत्र त्यांनी अवलंबले. करावं वाटतं ते करता येत नव्हतं. जे करावे लागत होतं ते आवडत नव्हतं. अशा कोंडीत त्या सापडल्या. तरीही प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड त्यांनी घातली. परमार्थाचा आनंद घेतला.

स्त्रियेचे शरीर पराधीन देह l न चाले उपाय विरक्तीचा l

शरीराचे भोग वाटतात वैरी l माझी कोण करी चिंता आता ll

अशी व्यथा त्या अभंगातून व्यक्त करतात.

बहिणाबाईंची निष्ठा पाहुनी संत तुकारामानी त्याना स्वप्नात दृष्टांत दिला. त्यावेळी त्या अठरा वर्षांच्या होत्या. त्यांचे जीवन बदलून गेले. ‘प्रपंच परमार्थ चालवि समान l तिनेच गगन झेलियेले l’ असे आपले जीवन त्यांनी आपण अभंगातून उलगडले. हळूहळू बहिणाबाईंचा लौकिक पसरू लागला. लोक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले. पण एका ब्राह्मण स्त्रीने शूद्र जातीच्या तुकारामाचे शिष्य व्हावे ही गोष्ट सनातन्यांना पटणारी नव्हती. नवराही संतापला. पण बहिणाबाई तुकारामांच्या अधिकार संपन्न शिष्या झाल्या. ‘मत्स जसा जळावाचूनि चडफडी lतैसी आवडली तुकोबाची l’अशा प्रकारची तगमग त्यांची तुकोबांविषयी असे. ‘स्वप्नामाजी कृपा केली पूर्ण’ अशी बहिणाबाईंची साक्ष आहे.

ब्रह्मज्ञांनी, भक्तीभाव व वैराग्याने त्या युक्त होत्या. नवऱ्याच्या संतापाला त्यांनी प्रतिक्रिया दिली.

‘भ्रताराची सेवा तोचि आता देव l भ्रतार स्वयमेव परब्रह्म ll

भ्रतार तो रवि मी प्रभा तयाची l वियोग त्याची केवी घडे ll

भ्रतारदर्शनाविण जाय दिस l तरी तेची राशी पातकांच्या ll

पुढे हळूहळू पतीचा स्वभाव बदलला.

काही दिवस त्या देहूला राहिल्या होत्या. तुकारामांची त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. तेथे असताना त्यांना दोन मुले झाली एक मुलगा व एक मुलगी. स्वतः ब्राह्मण असूनही ब्राह्मण कोण या विषयावर त्यांनी आपले सडेतोड विचार तत्कालीन सनातनी ब्राह्मणांना सांगितले. ‘ब्रह्म जाणणारा तो ब्राह्मण’ असे ठामपणे सांगितले. त्यांनी साधारण ७३२ अभंग लिहिले.

वारकरी संप्रदायाच्या इमारत उभारणीतील संतांच्या कार्याचे रूपकात्मक वर्णन करून संतांची माहिती लोकांवर बिंबवली. ती प्रसिद्ध रचना,

संत कृपा झाली इमारत फळा आली l

ज्ञानदेवे रचीला पाया उभारिले देवालया l

नामा तयाचा किंकर तेणे विस्तारले आवार l

जनी जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत l

तुका झालासे कळस भजन करा सावकाश l

बहिणी फडकती ध्वजा तेणे रूप केले ओजा l

त्यांचे अभंग अलंकारिक, रसपूर्ण, शांतरसाचे अधिक्य असलेले असे आहेत.

असे सांगतात की त्यांना आपल्या पूर्वीच्या १२ जन्मांचे स्मरण होते. चालू जन्म हा तेरावा होता. हे जन्म मरण्यापूर्वी त्यांनी अभंगातून आपल्या मुलाला सांगितले. ‘घट फुटल्यावरी l नभ नभाचे अंतरी l’ हा शेवटचा अभंग सांगितल्यावर त्या समाधीस्थ झाल्या. (१७००साली) शिरूर येथे त्यांचे समाधी आहे.

अशा या बहिणाबाई स्त्रियांना सुधारण्याचा मार्ग दाखवणाऱ्या क्रांतीज्योत !

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्त्री लेखन स्वातंत्र्य ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? विविधा ?

☆ स्त्री लेखन स्वातंत्र्य ☆ सौ राधिका भांडारकर

स्त्रियांना लेखन स्वातंत्र्य आहे का?

ती बोल्ड लिहू शकते का?

ती मनात येणाऱ्या सर्वच भावना सहजपणे लिहू शकते का?

या सर्व प्रश्नांना माझे एकच उत्तर आहे “हो”

“का नाही?”

पण ती लिहीत नाही हे सत्य आहे. चौकटी, मर्यादा, समाजाचे दडपण कोणत्याही प्रकारे तिच्या लेखनासाठी बंधनकारक आहेत असे मला वाटतच नाही.

स्त्रियांचे लेखन संकुचित असायला कारण स्त्री स्वतःच आहे. कारण बऱ्याच वेळा ती स्वतःच उंबरठे ओलांडायला, चौकटी मोडायला, व्यक्त व्हायला,

स्वतःच्या जीवनावर मोकळेपणाने भाष्य करायला तयारच नसते. परिणामी संसार, मुलंबाळं, कौटुंबिक नाती, सासु सुना, नातवंड, नवरा, जावई, सासरे, माहेर, अंगण याच्या पलीकडे स्त्री लेखन वाचायला मिळतच नाही. तिचं लेखन तिच्यापुरतं, तिच्या विश्वापुरतच मर्यादित असलेलं अनुभवायला येतं. फारफार तर नोकरी करणारी एखादी स्त्री लेखिका असेल तर थोडा वेगळा विषय ती हाताळताना जाणवतं परंतु तो विषय हाताळतानाही तिची मुळातली संसारिक सूत्रं वेगळी झालेली जाणवत नाहीत.

तिने लिहिलेल्या कथा, कादंबऱ्या, कविता, ललित यातही चौकटीतलंच स्त्री जीवनाचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. काही प्रमाणात विनोदी लेखन करणाऱ्या स्त्रिया आहेत पण त्यातही वाढलेलं वजन, माझे डाएट, शेजारीण, नाचगाण्यासारखे छंद, फसलेली पाककला, अवास्तव खरेदी, दुकानातले सेल, नवऱ्याचं बिच्चारेपण, अचानक येणारे पाहुणे या घरगुती विषयांव्यतिरिक्त फारसं काही वाचायला मिळत नाही. अभिरुची संपन्न, समाजाभिमुख असे पुल, सुभाष भेंडे, द. मा. शंकर पाटील, चिं वि. जोशी, दिवाकर वगैरे पुरुष लेखकांसारखं विनोदी लेखन सामर्थ्य स्त्री लेखिकांमध्ये अभावानेच आढळते. साहित्य क्षेत्रात स्त्री लेखिका आणि पुरुष लेखक असे दोन वेगळे विभाग नकळतच होतात. त्याला एक प्रमुख कारण म्हणजे स्त्री आणि पुरुषांच्या वैचारिकतेतील भिन्नता, निरीक्षण शक्ती आणि अभ्यासही. एका ठराविक परिघातच जगत असताना तिचे जीवनातले अनुभवही मर्यादित, चौकटीतलेच असतात. त्या पलिकडच्या जीवनाचा ती विचारही करू शकत नाही. परिघापलीकडे खूप मोठे मानवी जीवन आहे आणि ते टिपण्याचा किंवा त्याही जीवन प्रवाहाचा दूरस्थपणे भाग होऊन निरीक्षणात्मक वैचारिकतेचा प्रभाव तिच्या लेखनावर पडलेला दिसत नाही. ही वास्तविकता असताना समाजाने तिच्या लेखनावर मर्यादा टाकल्या आहेत किंवा ती बोल्ड लिहूच शकत नाही या म्हणण्याला काहीच अर्थ नाही. ठीक आहे! एक स्त्री. . “स्त्री विषयकच” लिहिणार परंतु त्यातही बहुतांशी स्त्री लेखिकांचे विचार, अनुभव, निरीक्षण, कल्पनांची व्याप्ती तोकडीच वाटते. तोच तोच पणा जाणवतो. याचं समर्थन “ती बंधनात असते म्हणून. . ” हे होऊच शकत नाही. माझ्या मते स्त्री जेव्हा एखादी कथा, कादंबरी किंवा लेख लिहिते तेव्हा त्यातूनही ती स्वतःला पाहत असते. स्वतःच्या प्रतिमेला जपत असते. “एक स्त्री असूनही तिने असं का लिहिलं?” या समाजाच्या टिकेचं भय तिनेच तिच्यावर पांघरलेलं असतं. आपल्या लेखनातून आपल्यावर “संस्कृती, नीती मूल्याचे पतन झाले” असे ओरखडे ओढले जाऊ नयेत हा प्रचंड मानसिक अडथळा तिच्या मनात तिनेच निर्माण केलेला असतो म्हणून ती मुक्त होऊ शकत नाही आणि मुक्तपणे लिहू शकत नाही.

अर्थात असेही अनुभव स्त्री लेखिकांना आलेले आहेत. कविता महाजन, मेघना पेठे, गौरी देशपांडे यांनी स्त्रियांचेच प्रश्न अतिशय धैर्याने आणि मुक्तपणे हाताळलेत. काही ना त्यांचे लेखन फार आवडलं तर काहींनी नाके मुरडली मात्र वेगवेगळ्या अभिरुचीचे, जडणघडणीचे वाचक हे असणारच पण लेखकाने (स्त्री अथवा पुरुष कुणीही) समाजाचा आरसा बनून वास्तवतेचे दर्शन(सुंदर ते ओंगळ) मुक्तपणे घडवून देऊ नये असा अर्थ होऊ शकत नाही. सखाराम बाईंडर, पुरुष, गिधाडे, बॅरिस्टर या गाजलेल्या नाटकांसारखी, ज्वलंत तडफडणारे विषय असलेली निर्मिती एखादी स्त्री लेखिका करू शकेल का? वास्तविक या टोकाच्या बोल्ड लेखनातही स्त्रियांच्या समस्या आहेत पण त्या पुरुष मनाच्या दृष्टिकोनातून मांडलेल्या आहेत म्हणजेच इथे महत्त्वाचा भाग येतो तो दृष्टिकोनाचा. स्त्री लेखिका स्वतःचे दृष्टिकोन विस्तारित का करू शकत नाही? तसलीमा नसरीन, इस्मत चुगताई, मन्नु भंडारी, कमला दास अरुंधती रॉय सारख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच लेखिका. समाजाचा प्रचंड विरोध आणि मानहानीला सामोरे जाऊनही त्यांनी लिहिलं. ते चांगलं वाईट याची मीमांसा न करता मुक्तपणे त्यांनी लिहिलं आणि समाजाची एक बाजू उघडी करण्याचं धाडस दाखवलं यात गैर काय??

स्त्री लेखनात विषयाची व्यापकताही कमी दिसते. अश्लीलता टाळूनही शृंगारिक लेखन करता येतं. प्रेमकथा आणि प्रणय कथा यात फरक आहे पण भावनांचा अविष्कार उलगडणारं स्पष्ट लेखन स्त्री लेखिकांकडून होताना दिसत नाही हे सत्य आहे.

 “न राहवून त्याने तिचा पटकन् मुकाच घेतला” किंवा “तिच्या भरदार वक्षस्थळांवर त्याची नजर खिळून राहिली. ” अशा तर्‍हेची भाषा किंवा वाक्यरचना स्त्री लेखिका सहजपणे करू शकेल का? का करू नये? का हरकत असावी? शब्द खेचून धरावेत की मुक्तपणे त्यांची प्रासंगिक उधळण करावी हा चर्चेचा विषय आहे.

कवी कालीदासांच्या मेघदूतातलं यक्षाच्या प्रेयसीचं वर्णन जर सुंदरच वाटू शकतं तर एखाद्या स्त्रीलेखिकेने केलेलं, त्यातलं सौंदर्य जाणून केलेलं रसभरित वर्णन “बोल्ड” का ठरावं? तेव्हा सरळ, सात्विक, मसालेदार किंवा बोल्ड असं काही नसतंच. त्या प्रसंगाची तीच मागणी असते असा विचार का करू नये?

लेखक किंवा लेखिका जेव्हा काही लेखनकृती करते तेव्हा त्यात स्वत:ची गुंतवणूक आणि अलिप्तता दोन्हीची गरज असते. आपण निर्माण केलेल्या पात्रांशी बंध जुळणे आणि प्रत्यक्षात ती पात्रं अलिप्तपणे पाहणे या दोघांचा समतोल साधला गेला तरच उत्कृष्ट आणि मुक्त विचारांचे लेखन होऊ शकतं हे एक लेखनतत्व आहे. त्यात समाज, स्व प्रतिमा, बंधने, मर्यादा याचा प्रश्नच येत नाही. माझ्या मते लेखकाची जबाबदारी ही आहे की भोवतालच्या समाज जीवनाचा सखोल अभ्यास करून त्यावरचे वास्तविक दर्शन देणारे लेखन करतानाही समाजाला चांगला सकारात्मक संदेश देणं ही लेखकाची जबाबदारी आहे. स्त्री लेखकाची आणि पुरुष लेखकाची ही.

काळाबरोबर जीवन पद्धती बदलतात. संस्कृती, नीतीच्याही व्याख्या बदलतात आणि बदलत्या जीवनपद्धतीवर सहअनुभूतीने विचार करून लिहिण्याचे सामर्थ्य स्त्रीलेखिकेकडूनही नक्कीच अपेक्षित आहे. आणखी एक मुद्दाही मला महत्त्वाचा वाटतो “मी एक स्त्री लेखिका म्हणून जेव्हा विचार करते” तेव्हा मला एक जाणवतं की मी रत्नाकर मतकरीं सारखी सुसूत्र गूढकथा नाही लिहू शकत. किंवा आगाथा ख्रिस्ती सारख्या रहस्यकथा लिहितानाही मी कमी पडते. माझ्याच मनाला मी बजावते की हा माझा जॉनर नाही पण हे कितपत स्वीकारार्ह आहे? खरं म्हणजे याला एकच कारण गूढकथा, रहस्यकथा लिहिण्यासाठी लागणारी अफाट कल्पनाशक्ती याचा अभाव. बहुतेक स्त्री लेखिकांबाबत हेच घडत असावं. कल्पनाविश्व किंवा कल्पनाशक्तीचे अपुरेपण यामुळेही स्त्री लेखिका त्याच त्या लेखन वर्तुळात फिरत राहते म्हणून याही गुणांना जाणीवपूर्वक विकसित करण्याची स्त्री लेखिकांना फार गरज आहे असे म्हटले तर ते गैर ठरू नये. ”घरात असता तारे हसरे मी पाहू कशाला नभाकडे” असा वैचारिक कल नसावा. माथ्यावरच्या विशाल नभाकडे जाणीवपूर्वक पाहण्याची दृष्टी मिळवावी आणि मुक्त लेखन बिनधास्त करावे याच मताची मी आहे. मेलोड्रामा किंवा गिमीक्समध्ये अडकू नये. एखाद्या घटनेकडे ती जशी आहे तशी बघण्याची आणि शब्दातून व्यक्त करण्याची गरज ओळखावी. असे लेखन यापूर्वीही स्त्री लेखिकांकडून झालेले आहे. पद्मजा फाटकची हसरी किडनी सुनीता देशपांडे यांचं आहे मनोहर तरी माधवी देसाई यांचं नाच गं घुमा किंवा कांचन घाणेकर यांचे “नाथ हा माझा” स्नेहप्रभा प्रधान यांचं स्नेहांकिता अगदी लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्रे ही बोल्ड लेखन प्रकारातलीच नव्हे का? अगदी अलीकडेच मी मृदुला भाटकर यांचं “हे सांगायलाच हवं” हे आत्मवृत्त वाचलं. असं लिहायला स्वातंत्र्यापेक्षा धाडसाची गरज असते. म्हणजेच स्त्रिया बोल्ड लिहू शकत नाहीत या विचार प्रवाहाला का वाहू द्यायचे?

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ५३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ५३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- मी नाईराजानं ते पैशाचं एन्व्हलप खिशात ठेवलं. पूर्वीपेक्षाही त्या पैशांचं ओझं मला आता जास्त जाणवू लागलं. ते ओझं हलकं केल्याशिवाय मलाच चैन पडणार नव्हती. मी सर्वांचा निरोप घेतला. जाताना केशवरावांना म्हणालो,

“माझ्याबरोबर कोपऱ्यावरच्या रिक्षा स्टॉपपर्यंत चला ना प्लीज”. ते तयार झाले. मी मनाशी निश्चय पक्का केला. अगदी मनाच्या तळ्यातलं जे जे ते सगळं त्यांच्याशी बोलायचं असं ठरवूनच टाकलं. पण ते माझं बोलणंच नंतर पुढचं सगळं अतर्क्य घडायला निमित्त ठरणार होतं याची मला तेव्हा कल्पनाच नव्हती.)

केशवराव आणि मी घराबाहेर पडलो. चार पावलं चालून गेल्यावर वाटेतच एक सार्वजनिक बाग दिसली. मी घुटमळलो.

“काका, आपण इथं बागेत बसूया पाच मिनिटं? मला थोडं बोलायचंय. ” सगळा धीर एकवटून मी विचारलं. ते ‘बरं’ म्हणाले. आम्ही आत जाऊन बसलो. मला सुरुवात कशी करावी ते समजेचना.

“बोल. काय बोलणार आहेस.. ?”

‘तू लहान तोंडी मोठा घास घेऊ नकोस.. ‘ हे माझ्या मोठ्या बहिणीचे शब्द मला आठवले आणि आपलं कांही चुकत तर नाहीय ना असं वाटून माझं अवसानच गळून गेलं. मी मान खाली घातली. त्यांच्या नजरेला नजर मिळवण्याचं धाडस मला होईना.

“बोल ना अरे,.. तू गप्प कां? काय झालंय.. ?”

त्यांचे आपुलकीचे शब्द ऐकून मला थोडा धीर आला.

“घरी.. ताईपुढे.. हे सगळं बोलता आलं नसतं म्हणून तुम्हाला त्रास देतोय… ” मी कसंबसं बोलायला सुरूवात केली. आवाज भरून आला न् मी बोलायचं थांबलो. त्यांनी मला अलगद थोपटलं. त्या स्पर्शानेच माझे डोळे भरून आले. मी महत्प्रयासाने स्वतःला सावरलं.

“काका, थोडं स्पष्ट बोललो तर रागावणार नाही ना?”

“नाही रे बाबा,.. बोल तू. “

“काका, आमच्या ताईशी तुमचं लग्न झालं ती खूप नंतरची गोष्ट ना हो? त्याआधी ती आमचीच होती.. हो ना? आमच्या घरातली. आमच्याचसारखी. फक्त तिचं तुमच्याशी लग्न झालं म्हणून तिच्या सगळ्या सुखदुःखांवर फक्त तुमचाच अधिकार कसा?

त्यातला आमचा वाटा आम्हालाही द्या ना. तो तुम्ही दोघेही नाकारता कां आहात?.. ” माझा आवाज भरून आला. आवेग ओसरेनाच.

“अरे.. असं काय करतोयस वेड्यासारखं?” ते मला समजावू लागले.

“मग पुष्पाताई आणि काका दोघे इकडे आले, तेव्हा त्यांनी दिलेले पैसे घेतले कां नव्हते तुम्ही? ‘नको’ म्हणून नाकारलेत कां? आज माझी भाऊबीजही ताईने नाकारली. कां? मी फक्त वयानं लहान म्हणून कुणाला कांहीच विचारायचं नाही कां?… “

माझं बोलणं ऐकून ते मनातून थोडंसं हलले. निरूत्तर झाले. थोडावेळ शून्यांत पहात राहिले. आता स्पष्ट बोलायची हीच वेळ होती.

“काका, हे फक्त तुमच्यावर नाही, आपल्या सर्वांवर आलेलं संकट आहे हे लक्षात घ्या. तुम्ही एकटे नाही आहात. आपण आता मी सांगतो तशी कामं आपण वाटून घेऊया. नोकऱ्यांमधल्या दूरवरच्या पोस्टिंगमुळे मला न् दादाला इथे राहून ताईची काळजी घेता येत नाहीय याचं दोघांनाही वाईट वाटतंय. तेव्हा आईने ठरवलंय तसं ताई बरी होईपर्यंत आई इथे राहून सगळं घरकाम सांभाळू दे. तुम्ही आणि अजित-सुजित ताईच्या औषधांच्या वेळा, तिला हवं-नको सगळं बघताच आहात. अजितच्या काकूंची एरवीही सोबत असतेच शिवाय त्या

हॉस्पिटलायझेशन असते तेव्हा रात्रभर तिच्याजवळ थांबून तिला सांभाळतातही.. यातली कुठलीच जबाबदारी आम्हा भावंडांना मनात असूनही शेअर करता येत नाही. त्यामुळे आजपर्यंतचा आणि याच्या पुढचाही ताईच्या उपचारांचा सगळा खर्च आम्ही भावंडं एकत्रितपणे करणार आहोत. त्याला तुम्ही प्लीज नाही म्हणू नका.. “

मी बोलायचं थांबलो. माझ्या बोलण्यात नाकारण्यासारखं काही नव्हतंच. ऐकता ऐकता त्यांची नजर गढूळ झाली. नजरेतल्या ओलाव्याने त्यांचा आवाजही भिजून गेला.

“तुला माझ्या मनातलं, अगदी खरं सांगू कां?” ते म्हणाले, ” हे मी आत्तापर्यंत घरी कुणापाशीच बोलू शकलेलो नाहीये. कारण माझ्यासारखे घरातले आम्ही सगळेच तुझ्या ताईच्या विचारानेच अस्वस्थ आहोत. तुझ्या बोलण्यातली तळमळ मला समजतेय. तुम्हा सगळ्याच भावंडांच्या सदिच्छांचाच मला या अगतिकतेत खूप आधार वाटतोय. पण खरं सांगू? तुझी ताई आता थोड्याच दिवसांची सोबतीण आहे हे निदान मी तरी मनोमन स्वीकारलंय. पहिल्या दोन केमोजच्या रिअॅक्शन्स तिला खूप त्रासदायक ठरलेल्या आहेत. तिसरा डोस अजून साधारण महिन्यानंतर द्यायचाय. तो ती कसा सहन करेल याचंच मला दडपण वाटतंय. त्यानंतरच ऑपरेशनची गरज आहे कां नाही हे ठरेल. एखादा चमत्कार घडला तरच ऑपरेशन न करता ती बरी होईल हेच वास्तव आहे आणि मी ते स्वीकारलंय. म्हणूनच माझ्या मनातल्या या घालमेलीची तिला कल्पना येऊ न देता मी रोज हसतमुखाने तिला सामोरा जातोय. कसलेही अवास्तव हट्ट न करता अतिशय समाधानानं तिने मला आजवर साथ दिलेली आहे. मला तिचा उतराई व्हायचंय. म्हणूनच मी तिला समजावतो, धीर देतो, हेही दिवस जातील हा माझ्यापरीने तिला विश्वास देत रहातो. ‘तुला कांही हवंय कां?.. जे हवं असेल ते मोकळेपणाने सांग.. मी आणून देईन.. ‘ असं मी तिला नेहमी सांगत, विचारत रहातो. ती हसते. ‘काही नको.. मला सगळं मिळालंय’ म्हणते. खूप शांत आणि समजूतदार आहे ती. त्यामुळेच निदान बाकी कांही नाही तरी तिच्या औषधपाण्याचा खर्च माझ्या कष्टाच्या पैशातून झाल्याचं समाधान तरी मिळावं एवढीच माझी इच्छा आहे. माझी ही भावना तू समजून घे. माझ्या नुकत्याच झालेल्या रिटायरमेंट नंतर हे संकट आलंय. यामागे ईश्वरी नियोजन असेलच ना कांहीतरी? म्हणून तर नेमक्या गरजेच्या वेळी माझ्या फंड ग्रॅच्युईटीचे आलेले साडेतीन लाख रुपये आज माझ्या हाताशी आहेत. माझ्या कष्टाच्या पैशातून तिच्या औषधपाण्याचा खर्च करायचं समाधान खूप महत्त्वाचं आहे रे माझ्यासाठी. असं असताना तुम्ही देताय म्हणून तुमच्याकडून पैसे घेणं योग्य आहे कां तूच सांग. तुम्ही सगळीच भावंडं मला कधीच परकी नाही आहात. माझ्याजवळचे हेही पैसे संपतील तेव्हा इतर कुणापुढेही हात न पसरता मी पहिला निरोप तुलाच पाठवीन. मग तर झालं?विश्वास ठेव माझ्यावर. “

मी भारावल्यासारखा त्यांचा प्रत्येक शब्द न् शब्द मनात साठवत होतो. ते बोलायचे थांबले तसा मी भानावर आलो.

“नक्की.. ?”

“हो.. नक्की. वयाने लहान असूनही तुम्ही प्रेमानं, आपुलकीनं, सगळं करू पहाताहात हे खरंच खूप आहे आमच्यासाठी.. ” ते मनापासून म्हणाले. मला खूप बरं वाटलं. मनातली रुखरूख विरुन तर गेलीच आणि केशवरावांबद्दलचा आदर अधिकच दुणावला. परतीच्या प्रवासात याच विचारांची मला सोबत होती. विचार करता करता खूप उशीरा माझ्या लक्षात आलं की वरवर ‘हो’ म्हणत केशवराव पैसे घ्यायला नाहीच म्हणाले होते! तरीही त्या मागचा त्यांचा विचार आणि भावना खूप प्रामाणिक आणि निखळ होत्या. ताईच्या घरातली ही ‘श्रीमंती’ हाच तिचा भक्कम आधार रहाणार होता!

ज्या क्षणी हे नेमकेपणानं जाणवलं आणि माझ्याकडून स्वीकारलं गेलं त्या क्षणीच ताईला मदतीच्या रूपात कांही द्यायचा माझ्या मनातला अट्टाहास संपला. आता एकच इच्छा मनात होती, या जीवघेण्या दुखण्यातून माझी ताई पूर्ण बरी होऊन पुन्हा ते घर पूर्वीसारखं हसतखेळत रहावं. त्या ‘आनंदाच्या झाडा’ची पानगळ संपून त्याला पुन्हा नवी पालवी फुटावी. ताईच्या मनात तरी यापेक्षा वेगळं काय असणार होतं? आणि शिवाय तिच्याही मनात वेगळ्या रूपातला कां असेना पण ‘तो’ आहेच की. तिची कसोटी पहाणारा आणि ताई कसोटीला खरी उतरेल तेव्हा तिला जे हवं ते भरभरून देणारा! ताई खरंतर प्राप्त परिस्थितीला तोंड देत, असह्य यातना सहन करीत, या कसोटीला उतरण्याचा जीवापाड प्रयत्न करते आहेच की. ते फलद्रूप होतील? व्हायलाच हवेत…. ‘ मी भानावर आलो. ताईच्या मनांत आत्ता याक्षणी असेच उलटसुलट विचार येत असतील? ती काय मागत असेल तिच्या मनातल्या

‘त्या’च्याकडे?… परतीच्या त्या संपूर्ण प्रवासात मनात असे भरून राहिले होते ते ताईचेच विचार…. !!

तो प्रवास संपला तरी तिची विवंचना आणि काळजी पुढे बरेच दिवस मनात ठाण मांडून माझं मन पोखरत राहिली होती…. ‘तुझी ताई आता थोड्या दिवसांचीच सोबतीण आहे हे मी मनोमन स्वीकारलंय’… हे केशवरावांचे शब्द पुढे कितीतरी दिवस मनात रुतून बसले होते. कितीही सकारात्मक विचार करायचा म्हटलं तरी त्यांचे ते शब्द मन बेचैन करत रहायचे.

ताईला केमोचा तिसरा डोस देऊन झाल्याचं समजलं तेव्हा वाटलं आता प्रतिक्षा संपली. आता कांही दिवसातच तिचा पुढचा चेकअप होईल आणि ऑपरेशन करावे लागेल की नाही याचा निर्णयही. आम्ही सर्वजण त्या निर्णयाचीच वाट पहात होतो. आॅपरेशन करायचं म्हटलं तरी ती ते सहन करू शकेल कां याबद्दलची साशंकता डाॅक्टरांनी पूर्वी व्यक्त केली होतीच.. आणि ती.. नाही सहन करू शकली तर.. ? केशवराव म्हणाले तसा खरोखरच एखादा चमत्कार घडून ऑपरेशनची गरज न भासताच ताई बरी होईल कां? असेच सगळे उलटसुलट विचार मनाला व्यापून रहायचे. थोडी जरी उसंत मिळाली तरी आम्ही भावंडं आपापल्या सवडीने ताईला भेटून येत असू. त्या भेटीत माझ्या आईच्या मनातली घालमेल, केशवरावांच्या बोलण्यातली अगतिकता, अजित-सुजित दोघांच्याही

नजरेमधे जाणवत रहाणारी व्याकुळता,.. हे सगळंच माझं मन अस्वस्थ करणारं होतं!

अखेर ताईच्या संपूर्ण चेकअपची तारीख ठरली… , ऑपरेशनची गरज निर्माण न होताच ती बरी व्हावी असं सर्वांनाच अगदी मनापासून वाटत होतं.. , याच अस्वस्थ अनिश्चिततेत चार दिवस

कापरासारखे उडून गेले.. !

आता प्रतिक्षा होती ती फक्त तिकडून येणाऱ्या फोनची… आणि त्यादिवशी फोनचा रिंगटोन वाजताच तिकडचाच फोन असणार ही खात्री असल्यासारखा मी फोनकडे धावलो…

फोन तिकडचाच होता…. !

“मामा… मी अजित बोलतोय…. “

त्याच्या उत्तेजित झालेल्या स्वरांनी माझा थरकाप उडाला… त्याच्या आवाजातली थरथर मला स्पष्ट जाणवली आणि मी थिजून गेलो… त्याला ‘बोल’ म्हणायचं भानही मी हरवून बसलो. थरथरत्या हातातला रिसिव्हर कसाबसा सावरत मी तसाच उभा होतो.. !!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गा रे कोकीळा गा…☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ गा रे कोकीळा गा… ☆ सौ शालिनी जोशी

काकः कृष्णः पिकः कृष्णः को भेदः पिककाकयोः।

वसंतसमये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः ।।

कावळा काळा कोकीळ काळा मग कावळा आणि कोकीळ यात फरक कोणता? वसंत ऋतूत कावळा कावळाच असतो तर कोकीळ कोकीळच. वसंत ऋतूत कावळा काव काव करतो तर कोकीळ कुहू कुहू.

शाळेत पाठ केलेले हे सुभाषित आज आठवायला कारण म्हणजे सध्या ऐकायला येणारा कोकीळ आणि कोकिळेचा कलकलाट. दिड महिना वसंत ऋतू झाला तोपर्यंत सर्व शांत होते. पण अलीकडे आठ दिवस पहाटेपासून त्यांचे हाकारणे सुरू असते. कधी खूप लांब वर आवाज येतो. तर कधी अगदी जवळ. पण आज दोन कोकीळ आणि एक कोकिळा यांनी शेजारच्या आंब्याच्या झाडावरती भरपूर दंगा केला. थोडा वेळ शांत मग तिघेही एकदम इतका आवाज करत होते की कोकिळेचा आवाज कोणता आणि कोकिळाचा कोणता कळतच नव्हते. शेवटी कलकलाट करत ते उडून गेले. अशाप्रकारे कधी एकटा कोकीळ तर कधी कोकीळा तरकधी सर्वच एकदम आवाज करत असतात. पहाटे पासून दिवस मावळेपर्यंत हा खेळ सुरू असतो. हाच त्यांच्या वसंतोत्सव असावा.

कोकीळ हा कावळ्याच्या जातीतला पक्षी, कावळ्या सारखाच तुकतुकीत काळा रंग. पण शेपटी थोडी लांब आणि चोच फिकट रंगाची व थोडी वाकडी. डोळा मात्र चकचकीत लाल गोल मण्यासारखा, त्यावर एक काळा ठिपका. फार सुंदर दिसतो. कोकिळाबाईंचा रंग थोडासा तपकिरी काळा. शेपटीवर, पोटावर पांढरे पट्टे आणि अंगभर पांढरे ठिपके. संक्रांतीला पांढऱ्या खडीची काळी साडी नेसतात तसा थाट.

कोकिळेचा आवाज गोड असे आपण समजतो. म्हणून लता मंगेशकरला ‘ गानकोकिळा’ म्हणतात. पण प्रत्यक्षात कोकिळेचा आवाज रखरखीत घशातून ओढून ताणून काढलेला किक किक असा. आणि कोकीळ तिला साद देतो ती मात्र मंजूळ कुहू कुहू अशा आवाजात. पण मनात असेल तरच, कित्येक वेळा कोकिळा हाकारून दमते तरी सुद्धा प्रतिसाद येत नाही. तिचा आवाज चिडका झालेला जाणवतो. पण महाराज प्रसन्न होतील तेव्हा ना? सध्या त्यांचा विणीचा हंगाम असावा.

असे दांपत्य झाडावरती दाट पानात दिसते. जमिनीवर वावरताना दिसत नाही. किडे, अळ्या खाऊन पोट भरते. पण भलतेच आळशी. ‘ असावे घरकुल आपुले छान’ असे त्यांना कधीच वाटत नाही. छोटे छोटे पक्षीही जमेल तसे, ओबडधोबड का होईना, आपले घरटे बांधतात. पण येथे कोकिळाबाई कावळ्याच्या घरातच आपली अंडी ठेवून हिंडायला मोकळ्या. काही वेळा कावळ्याची अंडी खाली फेकायलाही कमी करत नाहीत. बिचारी कावळा कावळी पिल्लं उडायला लागेपर्यंत सांभाळतात. कारण अज्ञानामुळे त्याला फरक कळत नाही.

पूर्वीच्या काळी स्त्रिया कोकिळाव्रत करत असत. म्हणजे कोकिळेचा ओरडलेला आवाज ऐकल्याशिवाय जेवायचं नाही. किती विचित्र आहे नाही? मला वाटते आवाज ऐकण्यासाठी कोकिळेला पोपटासारखे पिंजऱ्यात बंदिस्त ही करत असावे.

कोकिळांचा झाडावरचा वावर इतक्या माझ्या बडबडीला कारण झाला.

एकंदरीत कोकीळ हा असा वैशिष्ट्यपूर्ण पक्षी. त्यामुळे साहित्यात, काव्यात स्थान. पण एरवी वर्षभर त्याचा आवाज, अस्तित्व काही कळतच नाही. म्हणूनच ‘वसंताच्या आगमनी कोकीळ गाई मंजुळ गाणी’.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हे श्रीरामा… हे सीते… ☆ डाॅ. मधुवंती दिलीप कुलकर्णी ☆

डाॅ. मधुवंती दिलीप कुलकर्णी

 🌸 विविधा 🌸

☆ हे श्रीरामा… हे सीते… ☆ डाॅ. मधुवंती दिलीप कुलकर्णी ☆

हे श्रीरामा, वयाच्या चौदाव्या वर्षांपर्यंत तुला लाभलेले आयुष्य हे पूर्णपणे संस्कारांनी भरलेले होते. लहानपणी तू चंद्र खेळायला मागीतलास. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी राजा, तिन्ही राण्या, दास दासी झटत होते. कोणतीही वस्तू तुला खेळायला मिळाली. वात्सल्यामध्ये, प्रेमामध्ये तू न्हाऊन निघालास. पुढे वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात जाऊन तत्त्वांनी भारलेले प्रशिक्षण, जीवन तू जगलास. गुरूकडून मनाचा परखडपणा शिकलास. भावनांना आवर घालून स्पष्टवक्तेपणा कसा अंगी बाणवायचा हे त्यांनी तुला शिकविले. समाजहितासाठी दुसर्याच्या वैगुण्याबद्दल संतोष न बाळगता लोकांसाठी वंद्य गोष्टी करण्याची वृत्ती तू तेथे आत्मसात केलीस म्हणून तुला वालीवध आत्मविश्वासाने करता आला. मारूतीरायासारख्या भक्ताचा आदर्श तू समाजापुढे ठेवलास म्हणूनच समर्थ रामदासांनी उत्स्फूर्तपणे मंदिरे स्थापन करून समाजातील युवामन घडविले.

जनी निंद्य ते सर्व सोडोनि द्यावे|जनी वंद्य ते सर्व भावे करावे||

हे सर्वांच्या मनात रूजविले. मनातील सर्व शंकांचे निरसन वसिष्ठ मुनींच्या कडून करून घेऊनच तू घरी आलास. आल्यावरही लग्न होईपर्यंत राजकुमाराचे कोडकौतुकात वाढलास. शिक्षणामुळे, गुरू सेवेमुळे कौशल्य आणि अध्यात्मिक वृत्तीमुळे तू आदर्श व्यक्ती बनलास. सीतेसारखी पत्नी तुला मिळाली. तिने आयुष्यभर तुझी साथ सोडली नाही. बालपणीच्या कालखंडात तुला निरीक्षणातून विचार करता आला.. तुला निवांतपणे सर्व शिकता आले. आदर्शवत अशा बर्याच व्यक्ती तुझ्या आसपास होत्या. म्हणून तू मर्यादा पुरुषोत्तम, एकवचनी, एकपत्नी, एकबाणी झालास. तू होतासच शूर, करारी आणि चारित्र्यसंपन्न. तुला राज्याभिषेक होण्यापूर्वी वनवासाला जावे लागले. तिथूनपुढे तू पुन्हा राजा होऊन रामराज्य येईपर्यंत तुझे आयुष्य कसोटीचे ठरले. वयाच्या चौदाव्या वर्षांपासून ते अठ्ठावीस वयापर्यंत वनवासात राहून, रावणवध करून तू परत आलास. तुझ्या आयुष्यातील सर्व यशाचे गमक तुझ्या लहानपणात आहे. हे सांगण्याचा उद्देश एवढाच की, सध्या चंद्रच काय सूर्य, मंगळ हाताशी आहेत मुलांना अनुभवायला.. विज्ञानाची आकाशझेप एवढी आहे की, धनुष्यबाण कालातीत झालं आहे. रॉकेट, पिस्तूल, बॉम्ब इ. चा वापर सर्रास सुरू आहे. तुला मिळालेले लहानपण सर्व मुलांना मिळते. भरमसाठ शिक्षण फी भरायला राजाराणी एका पायावर तयार असतात. असलेच पाहिजे. गुरूकुलाचा चांगलेपणा इमारती व भौतिक सुविधांवरच तर ठरतो. पण “वसिष्ठ” शोधावे लागतात. सत्य-असत्य, धर्म- अधर्म यांतील फरक समजावणारा वसिष्ठ मिळणे दुरापास्त. असलाच तर इथं इतका विचार कोण करणार जसा राजा दशरथाने केला. भविष्यकाळ उज्ज्वल होणं न होणं हे आर्थिक सुबत्तेवरच अवलंबून असतं. इथं वनवासात कोण जाणार? लाड करूनही योग्य शिकवण तुला दिली गेली. आता फक्त लाड करायला वेळ काढला जातो. ते महार लाड झाले तरी आवडून घ्यावं लागतं. कारण आर्थिक व नोकरीच्या कसरतीत वर्तमानातील वेळ हा विनात्रासात निघून गेला ना, चला आता उद्याचे उद्या यां सुटकेवर आधारित असतो. वर्तमानच जर असा भीषण तर भविष्य काळ पैशाच्या डोंगरावर बसून वाट्याला आलेला एकाकीपणा भोगण्यात जाईल. तू आणि सीता वेगवेगळ्या ठिकाणी रहात असलात तरी एकाकी नव्हतात हे कधी कळेल समाजाला.?

हे रामराया, रामराज्य आल्यावरही न्याय निवाडा करताना तू स्वतः च्या आयुष्यातील ऐशो आरामाचा विचार न करता लोकराज्याचा विचार करून सितेला वनवासात पाठविलेस. होय पाठविलेसच त्याशिवाय का तिने कष्टाने मुलांना योग्य ठिकाणी, योग्य माणसांच्यात वाढविल्यानंतर, लोकापवाद दूर झाल्यावर त्यांना तुझ्या हातात देऊन ती धरणी मातेच्या पोटात गडप झाली. तिचा अनुभवातून आलेला कणखर स्वभाव तेंव्हाच दिसला. तिच्याएवढा घराचा विचार करणारी स्त्री आता नाही निर्माण होणार. आश्रमात अत्यंत साधेपणाने राहून तिने मुलांना जन्माला घालणे आणि वाढविणे याला महत्त्व दिले. त्यामुळे रामराज्य येऊनही सिंहासनापेक्षा वरचढ असे स्थान मुलांनी समाजात निर्माण केले. रामासाठी मुले संपत्तीपेक्षा श्रेष्ठ ठरली. सध्या वनवासात जायला कोणती मुलगी तयार होईल? काही कारणाने गेलीच तर कोण मुलांना जन्म देईल? सध्या सीता एकट्या रामाला वनवासात जा म्हणते. महाल सोडवत नाही. घरातील कष्टाला भिते. नोकरीच्या ठिकाणी मात्र राबराब राबते. बॉसला गोड बोलून लांगूलचालन करणे हा नोकरी टिकण्याच्या पाया आहे. याव्यतरिक्त आणखी शक्ती जगात असतील यावर युवापिढीचा विश्वास नाही. समर्थांनी सांगितलेले अधिष्ठान पूर्णपणे विसरून गेलेल्या रामसीतांना “सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे | परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे|| हे कोण शिकवणार? हे श्रीरामा, तू ये आता.

त्यावेळचे सुनयना राणीचे संस्कार मोठ्यांच्या आशिर्वादात, पतीच्या विचारात संसार करण्याचे होते. सध्या सुनयनाचे लक्ष पतीला बाजूला ठेवून भौतिक आस शमविण्यासाठी बाह्य जगात कसे वावरावे या संस्कारांकडे जास्त आहे. त्यामुळे भविष्यात सीतांना कुठेही रामराया सापडणार नाही.

म्हणून हे रामराया, तू लोकोद्धारासाठी पुन्हा जन्म घेच पण हे सीते, हे सुनयना तुम्ही मुलींना संसारात आदर्श दाखविण्यासाठी पुन्हा जन्माला या. पुन्हा समाजाचं भलं करा.

हे सीते, तू वनवासात गेलीस तरी किती सुखी होतीस, समाधानी होतीस हे सांगण्याची वेळ कलीयुगात आली आहेस. तू काटक्या गोळा करून संसार केला असशील पण रामाचे तुला मिळालेले प्रेम, त्या प्रेमाच्या जोरावर ताठ मानेने उभी राहिलेली तू, त्यामुळे वाल्मिकी ॠषींच्या आश्रमात ही आनंदी असणारी तू कुणाला कशी कळणार? सर्वांची आई होऊन सीतामाता झालीस. हे सर्व आता कोण सांगणार कुणाला? सर्व जगाचा वाईट अनुभव घेऊन नंतरच रामासमोर निस्तेज पणाने उभी रहाणारी सीता तुला तरी बघवेल का गं? म्हणून तुझी आज गरज आहे. खरंच तुझी गरज आहे.

हे रामा…… हे सीते…… तुम्हां दोघांची आज खरंच गरज आहे.

भले शर्ट, पॅन्ट, हॅट, गॉगल घालून या. हातात लॅपटॉप चे शस्त्र असू द्या. चारचाकीतून या. पण तुमची मने रामसीतेची घेऊन या. युवापिढी वाट पहात आहे… 🙏🙏

© डाॅ. मधुवंती दिलीप कुलकर्णी

जि.सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares