पाऊस आणि आठवणींचे काय नाते आहे देव जाणे! पण पाऊस आला की आठवणी येतात आणि आठवणींचा पाऊस मनात कोसळू लागतो! पावसासारख्याच आठवणींच्याही त-हा अनेक आहेत. कधी आठवणी इतक्या येऊन कोसळतात की त्यांची तुलना फक्त कोसळणाऱ्या पावसाशीच होते. कधी कधी त्या त्रासदायक असतात तर कधी आठवणी रिपरिप पडणाऱ्या पावसासारख्या असतात!आठवणी हळूहळू पण सतत येत राहतात, आणि मनाला बेचैन करतात! रिप रिप पडणारा पाऊस जसा सावकाश पण सतत राहतो, तशा या आठवणी सतत येतात आणि मनाच्या चिखलात रुतून बसतात. काही वेळा या आठवणी पावसासारख्याच लहरी असतात! कधी मुसळधार तर कधी तरल, विरळ अशा! कधीतरी अशा आठवणी वळवाच्या पावसासारख्या मृदगंध देणाऱ्या असतात! तापलेल्या मनाला शांत करतात. या आठवणींच्या गारा टप् टप् मोठ्या पडणाऱ्या असतात पण जितक्या वेगाने पडतात तितक्याच लवकर विरघळून जातात! रिमझिम पडणारा पाऊस हा प्रेमाच्या आठवणी जागवतो.त्यांची रिमझिम माणसाला हवीशी वाटते! त्या आठवणींच्या रिमझिम पावसात माणुस चिंब भिजून जातो. पाऊस आणि आठवणींचा अन्योन्य संबंध आहे असं मला वाटतं! पाऊस येत नाही तेव्हा सारं कसं उजाड, रखरखीत होतं! तसेच आठवणी किंवा भूतकाळ नसेल तर जीवन बेचव होईल. आठवणी या मनाला ओलावा देतात.पण हो, कधी कधी पावसासारख्याच या आठवणी बेताल बनतात. पाऊस कुठेही कोसळतो, पूर येतात तशाच त्रासदायक आठवणी काही वेळा माणसाचा तोल घालवतात .त्याला त्रासदायक ठरतात. अतिरिक्त पावसासारख्या च त्याही नाश करतात.
पाऊस आणि आठवणी दोन्हीही प्रमाणात पाहिजेत, तरच त्याची मजा! कधीकधी ऊन पावसाचा खेळ होतो आणि इंद्रधनुष्य निर्माण होते! तसेच जुन्या आठवणींना उजाळा देताना आपण अगदी आनंदून जातो.
मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या आठवणी इंद्रधनुष्यासारख्या सप्तरंगात उजळतात. आठवणींच्या थेंबावर आपल्या मनाचे सूर्यकिरण पडले की त्यावर दिसणारे इंद्रधनुष्य मनाला लोभवते आणि आनंद देते. अशावेळी आपलं मन इतके आनंदित बनते जसे की पावसाची चाहूल लागली की मोराला आनंद होऊन तो जसा नाचू लागतो! मन मोर नाचू लागतो तेव्हा सुंदर आठवणींचा पाऊस आपल्या मनात भिजवत राहतो. सृष्टीला जशी पावसाची गरज आहे तशीच आपल्यालाही छान आठवणींची गरज असते. कधी मंद बरसत, कधी रिपरिप तर कधी कोसळत हा आठवणींचा पाऊस आपण झेलतच राहतो…झेलतच रहातो!…
☆ ‘प्रिय देशबंधू / भगिनींनो,..‘ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆
प्रिय देशबंधू / भगिनींनो,
आज तुम्ही माझी पुण्यतिथी पारंपरिक पद्धतीने साजरी करीत आहात. मागील साधारण १०० वर्षात माझ्या मागे अनेक गोष्टी घडून गेल्या. अनेक नेते आले आणि गेले , भारताला स्वातंत्र्य (खंडित…!) मिळाले. आम्ही जहाल होतो हे फक्त पुस्तकात राहिले आणि अहिंसेच्या नादानपणाने कळस गाठला. तुम्हाला फक्त माझा एकच अग्रलेख आठवत असेल कारण पाठ्यपुस्तकात तो निदान तितका तरी छापला गेला आणि आजही तो टिकून आहे. असो….!
सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? अशा शीर्षकाचा आम्ही अग्रलेख लिहिला. त्याने आपल्या देशात जनजागृती झाली पण ब्रिटिश सरकारची माझ्यावर वक्रदृष्टी झाली. ते लोकं निमित्त्तच पाहात होते. मग त्यांनी माझ्यावर खटला भरला. मला शिक्षा झाली आणि मी मंडालेला गेलो. हे तुमचे माझ्यावर केलेली भाषणे ऐकून पाठ झाले आहे, याचि पूर्ण जाणीव मला आहे.
आपल्याकडे सध्या एक प्रथा सुरू झाली आहे. काही निवडक आणि दिवंगत नेत्याची पुण्यतिथी साजरी केली, त्यांच्या प्रतिमेला हार घातला, त्यांच्या त्यागाबद्दल चार गौरवोद्गार काढले, वृत्तपत्रात सरकारी खर्चाने पानभर जाहिरात दिली की तुम्ही आपल्या मर्जीनुसार वागायला मोकळे. असे वर्तन मागील अनेक वर्षे मी पहात वैकुंठातून पाहात आहे. आज अगदीच राहवले नाही म्हणून हा पत्र प्रपंच.
आमच्यावेळी स्वातंत्र्य मिळवणे हेच तरुणपिढीचे ध्येय होते आणि तेच योग्य होते. आज खंडित का होईना आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. आज त्याला ७५ पेक्षा जास्त वर्षे होऊन गेली आहेत. मागील ७५ वर्षात आपण आपल्या पुढील पिढीला कोणता इतिहास शिकवला? पराजयाचा की विजयाचा? आपल्याला खूप मोठा वारसा लाभला आहे, पण आपण त्याकडे उघडे डोळे ठेवून पूर्णपणे डोळेझाक केली आहे. सरकारने सर्व काही करावे आणि आपण मात्र हातावर हात ठेवून बसावे अशी मानसिकता ब्रिटिशांच्या काळात होती. अर्थात त्यांनी ती प्रयत्नपूर्वक निर्माण केली होती. मागील ७५ वर्षात तुम्ही त्याची री ओढलीत. आंगल् भाषेला माझा विरोध असण्याचे कारण नाही. पण माझी अपेक्षा अशी होती की तुम्ही आंगल् भाषा शिकाल आणि जगाला गीता, ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा, दासबोध समजून सांगाल. पण आपण तर अभ्यासक्रमात याचा समावेश होऊच दिला नाही…..
याला मी काय म्हणावे ?
प्लेगच्या साथीत ब्रिटिशांनी अनन्वित अत्याचार केले तेव्हा चाफेकर बंधूंनी त्यांचा सूड घेतला. इथे संसदेवर हल्ला करणाऱ्या नराधमांना माफी मिळावी म्हणून येथील बुद्धिजीवी स्वाक्षरीची मोहीम काढत आहेत.
पुढील पिढीला आपण नक्की काय देणार आहोत, याचा तरी विचार करा…
आज जे प्रश्न देशापुढे आ वासून उभे आहेत, त्यातील किती प्रश्न आपण आपल्या (अ)कर्तृत्वाने निर्माण केले आहेत आणि किती प्रारब्धवश आहेत…?
थोडा विचार करा…
माझ्या समकालीन असलेल्या काही लोकांनी जहाल ठरवले आहे. आता तसेच बोलून दाखवणे क्रमप्राप्त नव्हे काय ?
माझ्या नंतर मोहन ने स्वातंत्र्य चळवळीची धुरा हातात घेतली. स्वातंत्र्य मिळाले पण त्यातील स्व मात्र आपल्याला अद्याप गवसला आहे असे म्हणता येईल ? तुम्हाला असा विश्वास आहे ? आणि नसेल तर त्याला जबाबदार कोण ? यासाठी तुम्ही काय करणार आहात ?
ब्रिटिशांनी आपल्याला मला काय त्याचे? असा विचार करायला शिकविले? आणि तुम्ही मागील अनेक वर्षे हेच करीत आहात ?
असं ऐकतोय की तुम्ही स्वातंत्र्य मागील अनेक राष्ट्रपुरुषांची त्यांचा जन्माने प्राप्त झालेल्या जातींमध्ये विभागणी केलीत…!अरे याला बुध्दी म्हणायचे की विकृती ? ज्ञानाला मान देणारा भारतीय इतका विकृत कसा झाला रे….! आपला पुढारी सांगतोय, कुठल्या तरी पुस्तकात काहीतरी छापून आले म्हणून तुम्ही असे मुर्खासारखे वागू पहात आहात ? स्वतःची बुध्दी वापरणार की नाही ?
एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे की आपल्याला फक्त राजकीय स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे, आपण स्वतंत्र विचार करण्या इतपत अजून परावलंबीच आहोत….
आज माझी पुण्यतिथी साजरी करताना, वरील मुद्द्यांचा विचार आवर्जून करा. ही माझी विनंती नाही. अर्ज विनंती करणाऱ्यातला मी नाही. ठोकून सांगतोय. भले तर देऊ गांधीची लंगोटी, नाठाळाच्या हाती मारू काठी हे तुकोबांचे तत्त्वज्ञान जगणारा मी आहे.
तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की लोकमान्यांनी आजच हे पत्र का लिहिले असेल ? आपला प्रश्न रास्त आहे. पण तुम्हीच पहा ना ? आज तरुण काय करतोय ? आपल्या लेकीबाळी सुरक्षित आहेत ? ज्या छत्रपतींचे नाव घेऊन प्रत्येक पक्ष राजकारण करीत आहे, त्या छत्रपतींच्या किल्ल्याची दशा आणि दिशा काय झाली आहे ? ज्यांना शिवबांनी तलवारीने पाणी पाजले, त्यांची हिंमत किती वाढली आहे ?
मला तर वाटते आहे की पुन्हा भारत मातेच्या पोटी जन्म घ्यावा आणि पुन्हा एकदा सरकारचे, नव्हे येथील जनतेचे डोके ठिकाणावर आहे का असा अग्रलेख लिहावा.
पण मला खात्री आहे. तुम्ही सर्वजण देशभक्त सुजाण नागरिक आहात. थोडी वाट चुकली असेल तर या पत्राने पुन्हा योग्य वाटेवर याल आणि आपल्या भारत मातेला पुन्हा एकदा विश्वविजयी केल्याशिवाय राहणार नाही. सुज्ञास आणिक सांगायची गरज पडत नसते….!
☆ नाती आणि विश्वास… भाग-२ ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
(तसेच आपण, “आपल्या पत्नीला/पतीला, मुलांना आपण समाधानी,खूष ठेवले आहे का..?” याचा विचार प्रत्येक पुरुषाने/स्त्रीने नाती निभावताना करायला हवा.) – इथून पुढे —-
अमक्यानं दारूच्या नादापायी बायकोला जन्म भर छळलं… बाहेरख्याली पणा केला.. तोच वारसा त्याचा मुलगा चालवत असेल तर ते सर्वस्वी चुकीचे आहे. त्याची पुढची पिढी देखील हाच वारसा गिरवून आपले माणूसपण धोक्यात आणू शकतो.
समाजात वावरताना आपले कुटुंब, कुटुंबीय आपल्या पासून दूर नसावे.. काही कारणांमुळे कुटुंबापासून दूर जाऊन रहावे लागले तर नात्यांतील विश्वास अतिशय दृढ असावा.विश्वासाचे नाजूक बंध हे कौटुंबिक सौख्य जिवापाड जपतात.
नाती दिखावा निर्माण करणारी नसावीत. इतरांच्या मनाचा विचार करून जोपासलेली नाती तुमचे अस्तित्व जास्त प्रगल्भ ठरवतात.
नवीन पिढीला आता संस्कारापेक्षा व्यवहार जास्त महत्वाचा वाटतो. पैसा असेल तर माणूस ताठ मानेने जगू शकतो हा अनुभव त्याला आपल्या माणसात दुरावा निर्माण करायला भाग पाडतो. जुन्या पिढीतील नातवंडे सांभाळणारी जुनी पिढी ,त्यांचे विचार , नव्या पिढीला नकोसे वाटतात. ”पैसा फेको तमाशा देखो ” हे ब्रीद वाक्य घेऊन नवीन पिढी माणुसकी पेक्षा मतलबी पणाला प्राधान्य देताना दिसते.
जमाना बदललाय भाऊ असं म्हणत प्रत्येक पिढीने सोयीस्कर रित्या आपले रहाणीमान बदलले. चुकांचे समर्थन करण्यासाठी नवे साधन मिळाले. सुनेने सासू ला आत्याबाई सोडून आई म्हणायला सुरवात केली. मामंजीचे पप्पा झाले. पण नात्यातला संघर्ष होतच राहिला. जनरेशन गॅप तशीच राहिली. फक्त तिचे स्वरूप बदलले.
सासुबाई नऊवारी साडीतून पंजाबी ड्रेस मध्ये आल्या. मामंजी धोतरातून सुट बूट, सलवार कुडता अशा पेहरावात आले. नातवंडे मुलांच्या इच्छेने वाढू लागली. वडील धा-यांनी नातवंडांचे फक्त लाड करायचे आणि वेळप्रसंगी आजी आजोबांनी नातवंडांचा संभाळ करायचा एवढ्या परीघात नाती फिरू लागली.
मौज मजा, ऐषोराम, एकमेकांवर केलेला खर्च यात नात्याचा हिशोब होऊ लागला. रक्ताची नाती गरजेपोटी उपयोगात आणण्याचा नवा प्रघात सुरू झाला आणि ग्रामीण भागातील समाज पारावर पिंपळपारावर खळबळ माजली. वृद्धाश्रम आणि पाळणाघर यांना काळाची गरज आहे अशी शहरी लोकांनी दिलेली मान्यता गावातील वृद्धांना घातक ठरू लागली. गावातल्या गावात एकाच कुटुंबातील दोन पिढ्यांची दोन घरे झाली. शेतातल घर अर्थातच म्हाताऱ्याच्या वाट्याला आले. आणि गावातील घर दुमजली होऊन दोन भाऊ स्वतंत्र दोन मजले करून वरती खाली राहू लागले. शेती करण्यासाठी पगारी मजूर बोलावताना जुनी पिढी हळहळली पण त्याच वेळेस आलेले उत्पन्न वाटून घेताना उगाचच कुरकुरली.
समाज पारावर देखील अनेक बदल घडत आहेत. माणूस माणसापासून दूर जातो आहे. आणि याला कारणीभूत ठरला आहे तो पैसा आणि नात्यांमधील विश्वास.
बदलत्या जमान्यात माणूस ओळखायला शिकले पाहिजे हेच वारंवार कानी पडते. हा माणूस ओळखायच्या स्पर्धेत आपण मात्र कंपूगिरी करत आहोत. आपल्या उपयोगी पडणारा तो आपला. गरज सरो नी वैद्य मरो या उक्ती प्रमाणे आपल्या माणसाची व्याख्या बदलते आहे. बदलत्या काळात जात पात धर्म भेदभाव नष्ट होत असले तरी आर्थिक विषमता हे मूळ माणसामाणसात प्रचंड दरी निर्माण करीत आहे. ही विघातक दरी जनरेशन गॅप पेक्षा ही विनाशकारी आहे.
भाऊ, बहिण, मित्र, मैत्रीणी, पती, पत्नी,आई, वडील, गुरू जन, आप्तेष्ट या नात्यापेक्षा पैसा मोठा नाही याची जाणीव माणसाचं माणूस पण शाबूत ठेवते. आपण घेतलेले निर्णय,जपलेली नाती, कमावलेला विश्वास यांवर आपली यशस्वीथा अवलंबून आहे. दृष्टीआड सृष्टी अशी वागणूक नसावी.आपल्या माणसाचं आपली सृष्टी विश्वासानं बहरावी हा जीवन प्रवासाचा खरा हेतू आहे.
आपण सर्व जण ज्या मार्गाने जात आहोत त्या मार्गावर वाडवडिलांचे आशिर्वाद, संस्कार अभावानेच आढळतात. पण महत्व कांक्षी विचारांना पुढे करून स्वार्थाला दिलेले अवाजवी महत्त्व माणसाला एखाद्या वळणावर तो एकटा असल्याची जाणीव करून देत आहे.
माणूस किती शिकला? काय शिकला? यापेक्षा तो आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी आहे का याची चर्चा माणसातला आपलेपणा नष्ट करते. बसा जेवण करूनच जा असा आग्रह करणारे आज फालतू कारणे शोधून बाहेर हाॅटेलमध्ये स्नेहभोजनाचे जंगी बेत आयोजित करतात यातून व्यवहार सांभाळत पुढे जायचे हा कानमंत्र एकमेकांना देत ही कंपूगिरी समाजात एकमेकांना धरून रहाते.
मन दुखावले की नाती संपली. भुमिका बदलल्या. पात्रे बदलली. पैसा सोबत असला की माणसांची गरज नाही. पैशाने माणूस विकत घेता येतो हा विचार करत सर्व जीवन प्रवास चालू आहे. संवाद माध्यमातून प्रबोधन करणारी पिढी समोरासमोर आली तरी ओळख दाखवताना दहा वेळा विचार करून ओळख दाखवते अशी सद्य परिस्थिती आहे. नवीन पिढीला आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण करून देताना आपण आपल्याच लेकरांना चार भिंतीची ओळख करून देतो पण त्या भिंतीवर असणाऱ्या छप्पराचे , त्या चार कोनाचे कौटुंबिक महत्त्व सांगायला विसरतो.
नव्या वाटेने चालताना जुन्या आठवणींना उजाळा देणारे प्रसंग घडतात. तेव्हा आपली माणसे आपल्या सोबत असावीत. नव्या जमान्यात वावरताना आपण कुठे चाललो आहोत याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आपला जीवनप्रवास ह्रदयापासून ह्रदयापर्यत व्हायला हवा इतके जरी आपण ठरवले तरी मला वाटत आपण माणसांना घेऊन, माणसासोबत अत्यंत विश्वासाने , कोणत्याही बाबतीत खोटेपणा न करता, आपल्या वर मनापासून प्रेम करणाऱ्या माणसांची कदर करीत, आपण आपला जीवन प्रवास सुरू ठेऊ. आपण एखाद्या व्यक्तीशी नाते जोडताना कींवा जोडलेले नाते तोडताना आपण ते नाते विश्वासार्ह पद्धतीने निभावले आहे का याचा विचार केला आपला जीवन प्रवास नक्कीच यशस्वी ठरेल.
संशयास्पद वर्तन असणे यांत कोणताही पुरूषार्थ, मर्दुमकी, कींवा आत्मसन्मान नाही कींवा तेमाणूसकीच लक्षण देखील नाही. माणसाचं माणूस पण त्याच्या अस्तित्वात असावं आणि त्याचं अस्तित्व कुठल्याही असत्यावर आधारलेलं नसावं तरच नाती अबाधित रहातात आणि जीवन प्रवास सुखकर, समृद्ध आणि समाधानी होतो. माणूस श्रीमंत होतो आणि आमरण प्रवास करतो..होय.. या ह्रदयापासून ह्रदयापर्यत…!
☆ नाती आणि विश्वास… भाग-१ ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
आयुष्यात शिक्षण, संस्कार, प्राथमिक मुलभूत गरजा यांच्या सोबतीने आवश्यक असते ती म्हणजे आपण जोडलेली, निभावलेली नाती. ही नातीच आपला समाज असतो. या समाजाचं आपण काही ना काही देणं लागतो.
पैसा आयुष्यात जितका महत्त्वाचा आहे तितकीच नाती आणि जिवाभिवाची माणसं देखील महत्वाची आहेत. माणसाचं माणूस पण, माणुसकी जपणारी ही नातीच त्याचं समाजातील अस्तित्व ठरवतात.
अमली पदार्थ सेवन, व्याभिचार या वैयक्तिक बाबी आहेत. त्याचा अतिरेक किंवा लपवा छपवी नात्यात अत्यंत घातक असते. “जसा बाप तसा बेटा” ही म्हण कायमच चांगल्या अर्थाने वापरात यायला हवी.
आपल्या मुलानं तरी आपण केलेल्या चुका करून इतरांची मने दुखावू नयेत या करिता आपण आपली वागणूक, वर्तन, व्यवहार आदर्श वत असावा.
आपण कुणाचा आदर्श घ्यायचा? कुणाचा आदर्श समोर ठेवायचा? आपली जबाबदारी ,आपली कर्तव्ये हे सारे जर आपण आपल्या आर्थिक परिस्थितीशी निगडीत केले तर हा गुंता सोडवायला अतिशय कठीण जाईल.
आपण आणि आपली जबाबदारी यात जोपर्यंत ”आई बाबा ‘, यांचा समावेश होत नाही तोपर्यंत ही पळवाट आडवाटेनं या समाज व्यवस्थेला , कुटुंब व्यवस्थेला दुर्बल करीत रहाणार यात शंका नाही.
विश्वास हा दोघांचा दोघांवर, दोन्ही कडून तितकाच दृढ असायला हवा. नात्यात हा विश्वास पटवून देण्यासाठी कींवा संशयास्पद वातावरण निर्मिती साठी,नात्यात कटूता, संशय, सामंजस्य निर्माण होण्यासाठी,तिसऱ्या व्यक्तीची गरज लागावी यांसारखे दुर्दैव नाही. नात्यात पारदर्शकता असेल संशय, अविश्वास निर्माण होत नाही आणि जर झालाच तर तो वेळीच निराकरण होणे अत्यंत गरजेचे असते अन्यथा नाते संपुष्टात येते. नात्यात बदली माणूस येऊ शकतो पण तो आपल्या माणसाची जागा घेईलच असं नाही. आपण आपल्या कुटुंबास जसे वागवतो तसेच आपली पुढची पिढी त्याच्या कुटुंबाशी, समाजाशी वागणार आहे याचा विचार करून आपण आपले वागणे ठेवायला हवे.
“मी माझ्या माणसांचा आहे, घरातील बाई माणूस माझ्या कुटुंबाचा घटक आहे त्याच मन जपणे ही माझी जबाबदारी, आद्यकर्तव्य आहे…” हे जोपर्यंत पुरुष प्रधान संस्कृती मान्य करीत नाही तोपर्यंत ही पळवाट अशीच निघत रहाणार. आपण घडायचं की आपण बिघडायचं ..? घरातल्या स्री ला आधार द्यायचा की , आपल्या संशयास्पद वागणुकीचा भार व्हायचं हे आता ज्याचं त्यानचं ठरवायचं. ..!
पुरूषाला मैत्रीणी आणि स्त्रियांना विवाहोत्तर मित्र जरूर असावेत..पण त्यात दोन्ही बाजूंनी पारदर्शकता असावी..! “मी सांगतो आहे तेच खरं आहे.. तुला विश्वास ठेवायचा असेल तर ठेव” असं सांगून जर आपण असत्याचा आधार घेतला तर आपण इतरांना नाही पण स्वतः ची मात्र अवश्य फसवणूक करतो.
आयुष्याच्या प्रवासात प्रत्येकावर खोटं बोलण्याची वेळ येते.. काही वेळा इतरांचे मन जपण्यासाठी ते आवश्यक देखील असते..पण या खोट्या ची बोलणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला सवय होऊ नये हे पथ्य पाळायला हवे.
पती पत्नीच्या नात्यात विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रेमापोटी नात्यातील एकच व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या सर्व चुका माफ करत असेल,त्याने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला सत्य मानून त्यावर विश्वास ठेवत असेल तर त्या व्यक्तीचा विश्वासघात होऊ नये याची काळजी दुसऱ्या व्यक्तीने घ्यायला हवी. आपले गृहस्थ जीवन जितके सुखी, आनंदी, समाधानी असेल,तितके आपण जीवनात यशस्वी होतो. आपल्या मनात येईल तसे वागणे, भरपूर पैसा कमावणे,आपली व्यसने जोपासणे, उच्च शिक्षण घेऊन विशिष्ट समाजात नाव लौकीक निर्माण करणे म्हणजे यशस्वी जीवन नव्हे.. “आपल्या मनातली माणूसकी इतरांच्या मनात अबाधित रहाणं” हे यशस्वी जगण्याचं खरं सूत्र आहे.
आई वडील जन्म भर पुरत नाहीत पण आईवडिलांनी केलेले संस्कार आपण आपल्या पुढील पिढीला समर्पित करणे आपले आद्य कर्तव्य आहे.
आपल्या वडिलांच्या दुर्गुणांचा त्याग करून त्यांच्या मधील सद्गुणी वारसा उचलणे जास्त हितकारक असते.
“आपलं ठेवायचं झाकून.. अन् दुसऱ्याचं पहायचं वाकून” ही मानसिकता बदलायला हवी. मैत्री च्या नात्यात तर (पारदर्शकता,) प्रेम आणि विश्वास हेच त्या नात्यांचे श्वाच्छोश्वास ठरतात. मैत्री त अशी काही गुपिते जिवापाड जपली जातात जी, जीव गेला तरी एकमेकांच्या ओठांवर येतं नाहीत.वेळप्रसंगी असे मित्र आपल्या कठीण काळात आपले आधार ठरतात. अशा मित्रांना कधीही विसरू नये. असा मित्र रागावला तरी तोच आपला खरा, सच्चा नातेवाईक असतो.कारण त्याचा राग म्हणजे दुसऱ्याच्या चुकीसाठी स्वतः ला करून घेतलेली शिक्षा असते. जिथे जिवापाड प्रेम असते.. नात्यात तिथेच राग ही असतोच.
मी मध्यंतरी वाचले होते,
“मनुष्याचा पृथ्वीतलावरचा प्रवास संपला की त्याच्या गुणकर्मास आठवून इष्टमित्र व नातेवाइकांस अश्रू अनावर होतात. हे स्वाभाविकही आहे. ज्याच्याबरोबर खेळलो, बागडलो, सुख-दु:खाचे अनेक प्रसंग वाटून घेतले तो आयुष्याचा साथीदार जर निघून गेला तर दु:खाचा बांध फुटतोच*
परंतु ज्याचे कुणीच नाही, ज्याने जगताना सुख-दु:ख कधी वाटून घेतले नाही, कुणाच्या हाकेला कधी धावून गेला नाही अशा माणसाचा मृत्यू झाल्यानंतर रडायचे कुणी? पण कुणीतरी गेल्यावर,कुणीतरी रडणे ही तर एक जगरहाटी आहे. म्हणून निव्वळ यासाठी तरी नाती जोडा नाती जपा….!!!”
माणसाच्या माघारी कोण त्यांच्या साठी किती रडला,कसा रडला यापेक्षा तो कसा जगला..कसा होता याच्या आठवणी माणसाला जास्त रडवतात.माणसाचं माणूसपण त्याच्या खरे पणाने सिद्ध होत.त्यानं नात्यात केलेल्या आर्थिक उलाढाली वर नाही. हिशोब कागदावर रहातो.पण नाती मनात कायम जिवंत रहातात.. अगदी कोणी कितीही दूर गेला तरी मनात जोडलेली नाती मनात कायम रहातात. कारण त्या व्यक्तीनं दिलेलं प्रेम, विश्वास, आपलेपणा आणि निभावलेलं नातं यांवर त्याच, तिचं नातं अबाधित रहातं.
अतिशय सुंदर असा संदेश यातून दिला गेला. कुटुंबातील व्यक्ती हाच आपला एकमेव आधार आहे . “आपल्या कुटुंबातील माणसांना आपण आपला वेळ द्यायला हवा” आपण हा सल्ला इतरांना देताना आपण आपल्या कुटुंबातील व्यक्तींसाठी विश्वास पात्र आहोत का..? “आपण आपल्या कुटुंबातील व्यक्तींना किती विश्वासात घेतो, किती वेळ देतो..?” तसेच आपण, “आपल्या पत्नीला/पतीला, मुलांना आपण समाधानी,खूष ठेवले आहे का..?” याचा विचार प्रत्येक पुरुषाने/स्त्रीने नाती निभावताना करायला हवा.
☆ ‘नागपंचमी…‘ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆
सनातन वैदिक हिंदू धर्म हा एकमेवाद्वितीय आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक सर्व सण/उत्सव हे विज्ञानावर तरी आधारित आहे किंवा कर्तव्यावर. ‘कृतज्ञता’ हा हिंदू संस्कृतीचा आत्मा आहे. निव्वळ ‘सोहळा’ (इव्हेंट) साजरा करणे हा कोणत्याही सणांचा किंवा उत्सवाचा हेतू खचितच नाही. नागपंचमी सुद्धा त्यास अपवाद नाही. एकच चैतन्य सर्व प्राणीमात्रांत भरून राहिले आहे, यावर हिंदू धर्माचा नुसता विश्वास नाही तर तशी पक्की धारणा आहे. हिंदू धर्मियांनी ‘तसे’ आचरण करून दाखविले आहे, असे आपल्या लक्षात येईल. ही परंपरा खूप प्राचीन आहे. त्याकाळात दळणवळणाची, संपर्काची अल्पसाधने असतानाही तत्कालीन समाज व्यवस्थेने ही परंपरा रुजवली, सांभाळली आणि वृद्धिंगत केली. याबद्दल आपण सर्वांनी आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे अत्यावश्यक आहे. आज मात्र ही हजारो / लाखो वर्षांची परंपरा कुठेतरी शीण होते की काय असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे. ब्रिटिशांना जे त्यांच्या सुमारे दीडशे वर्षांच्या राजवटीत जमले नाही ते मात्र त्यांनी घालून दिलेल्या शिक्षणपद्धतीने सत्तर वर्षात करून दाखविले आहे असे खेदाने नमूद करावे लागत आहे. एका अर्थाने आज हिंदू धर्म हा अप्रागतिक, बुरसटलेल्या विचारांचा आणि एकूणच मागासलेला आहे असा जो प्रचार सर्वच माध्यमांतून चालू आहे त्यास प्रत्युत्तर देणे हा या लेखनाचा हेतू निश्चित आहे, पण तो गौण आहे. या लेखाचा मूळ हेतू हा आहे की आपला हिंदू धर्म हा विश्वातील सर्व धर्मांमध्ये वैज्ञानिकता आणि कृतज्ञता याबाबतीत सर्वश्रेष्ठ आहे आणि तसे आपण साभिमानाने जगास सांगितले पाहिजे. आज त्याची नितांत गरज आहे.
हिंदू धर्मात पशुपक्षांचीही कृतज्ञभावाने पूजा करण्याची पद्धत आहे, परंपरा आहे. गायीवासरांसाठी ‘वसुबारस’, शेतीच्या कामास उपयुक्त ठरणाऱ्या बैलांसाठी ‘बैलपोळा’, मधुर आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या कोकिळेसाठी ‘कोकिळाव्रत’ तर शेतीचे उंदरांपासून आणि इतर किटकांपासून संरक्षण करणाऱ्या नागांसाठी ‘नागपंचमी’, वनरक्षणासाठी ‘वटपौर्णिमा’, अशा प्रमुख सणांचा उल्लेख करता येईल. नागांचा इतिहास मनुष्याइतकाच पुरातन आहे असे म्हणता येईल. साक्षात देवाधिदेव महादेव यांनी नागाला आपल्या कंठी धारण केलेले आहे. कृष्णलीलांमध्ये कालिया मर्दन प्रसिद्ध आहे. त्यानंतर मंगलमूर्ती गणपतीच्या कमरेत नाग आहे, तर सर्व सृष्टीचे पालक भगवान विष्णू हे स्वतः शेषशायी निवास करतात. रामावतार आणि कृष्णवतारात स्वतः शेषनाग भगवंताचे एकदा ज्येष्ठ बंधू झाले तर एकदा कनिष्ठ बंधू झाले. नागास शेतकऱ्यांचा मित्र असेही म्हणतात. सरपटणाऱ्या प्राण्यांचे राजे हे ‘नागराज’ असावेत. राजाचा मान केला की स्वाभाविकपणे तो आपसूकच प्रजाजनांचाही होतो. या दृष्टीने विचार करता नाग हा आपल्या संस्कृतीचा तसेच आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे.
नाग देवता आणि त्यांची प्रजा यांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. वडाच्या फांद्या तोडून पूजा करणे आणि नागोबाला पकडून त्याची पूजा करणे हे दोन्ही एकाच प्रकारचे आहे आणि दोन्हीही त्याज्यच आहे. भले साप दूध पीत नसेल, नागाणे खात नसेल, पण त्यामागील मुख्य हेतू अथवा मर्म लक्षात न घेता मी त्यावर टीका करणार नाही, आपल्याच परंपरांची खिल्ली उडवणार नाही, असे आज प्रत्येकाने ठरवण्याची गरज आहे. हा सण श्रावणात येतो. या महिन्यात हवा सारखी बदलत असते, पोटातील वैश्वानर थोडा मंद असतो, म्हणून भाजलेले कडधान्य, दूध, लाह्या इ. पदार्थ पचावयास हलके आणि पौष्टिक असतात. म्हणून ते नागाला वाहण्याची पद्धत असावी. दुर्वा ही औषधी वनस्पती आहे. ती सुद्धा नागास वाहिली जाते. त्यानिमित्ताने दुर्वा दारी राहतील असाही प्रयत्न असावा. कृषिप्रधान देशात कृषिला उपयुक्त ठरणाऱ्या सर्व भूतमात्रांचे मनुष्याने ऋणी असणे अत्यंत गरजेचे आहे असे मला वाटते.
नाग, सापांची उपयुक्तता घरोघरी, शाळा, महाविद्यालये यांच्यामध्ये जाऊन सांगितली पाहिजे. नागांमुळे उंदरांच्या संख्येवर नियंत्रण राहते. हरित क्रांतीची मनीषा पूर्ण व्हायची तर उंदरांच्या पोटात जाणारे धान्य वाचवावे लागेल. प्रत्येक तीन पोत्यापैकी एक पोते उंदीर खातात. म्हणूनच नागपंचमीचे आधुनिक व्रत ‘धामण पाळा नि धान्योत्पादन वाढवा’ अशा उद्घोषणाबरोबरच ते कृतीतूनही व्हायला हवे. तरारून आलेल्या शेताकडे पाहून कृषी कन्यांना केवढा आनंद होतो ! मग त्या भविष्याची सुख- स्वप्ने पाहात उंच उंच झोके घेतात व हा सण साजरा करतात. या काळात मुलांनी मैदानी खेळ खेळावे अशी जुनी प्रथा आहे. त्यासाठी मैदानी खेळांच्या स्पर्धा भरविण्याचा संकल्प श्रावणात धरावा व चातुर्मासात पूर्ण करावा. पर्यावरण संतुलन करण्यामध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांचा अर्थात नागदेवतेचा मोठा वाटा आहे. निसर्गात प्रत्येक जण एकमेकांवर अवलंबून आहे. ही एक जीवनसाखळी आहे. यातील एक दुवा जरी निस्टला तरी पूर्ण साखळी तुटते. आज पर्यावरणाची जी गंभीर समस्या निर्माण झाली आहे त्यामागे या ‘साखळी’चा कमकुवतपणा कारणीभूत आहे. याबाबतीत आज ‘सर्पमित्र’ अतिशय जबाबदारीने कार्य करीत आहेत. आजच्या मंगलदिनी त्यांचेही कौतुक करायला हवे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञताही व्यक्त करायला हवी. सरपटणाऱ्या प्राण्यांबद्दल आदर करण्यासाठी घरांमधून कापणे, चिरणे आदी आजच्या दिनी वर्ज्य केले जाते. शेतकरी आजच्या दिवशी जमीन नांगरत नाहीत, एकूणच शेतीच्या कामांना सुट्टी असते.
याबाबत काही पौराणिक कथाही सांगितल्या जातात. विस्तार भयास्तव त्या इथे देत नाही. आपण सर्वांनी नागपंचमीचे महत्व समजून घेऊ आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी या सरपटणाऱ्या प्राण्यांची हत्या न करण्याचा संकल्प करू आणि खऱ्या अर्थाने नागपंचमी साजरी करू.
(पूर्वसूत्र- मनातले इतर सगळे प्रश्न,सगळ्या विवंचना,नवीन ब्रॅंच कशी असेल, तिथला स्टाफ कसा असेल या विचारांचं उत्सुकतेत लपलेलं दडपण हे सगळं दूर सारत पौर्णिमेच्या नित्यनेमाबद्दलचा ‘ते निर्विघ्नपणे पार पडेल ना?’ हाच प्रश्न मनात ठाण मांडून बसला. मग पूर्ण प्रवासात ते कसं साध्य करायचं याच्या उलटसुलट विचारांच्या गुंत्यात महाबळेश्वर स्टॅण्ड कधी आलं ते समजलंच नाही. सगळं सामान एका हातात कसंबसं घेऊन आणि दुसऱ्या हातात लहान बॅगेसोबतच जमेल तशी धरलेली छत्री सावरत मी बसच्या पायऱ्या उतरु लागणार तेवढ्यात तिथेच थबकलो. कारण समोर माझ्या स्वागताला विकट हास्य केल्यागत प्रपातासारखा कोसळणारा अखंड पाऊस माझी वाट अडवून ओसंडत होता! माझ्याइतकीच हतबल झालेली हातातली छत्री न् सामान जमेल तसं सावरत मी त्या भयावह, धुवांधार प्रपाताला सामोरं गेलो ते मनातल्या ‘त्या’च्या विचाराचं बोट घट्ट धरूनच!)
बसमधून उतरून धावत स्टॅंडवर आत आडोशाला जाऊन थांबेपर्यंतच मी चिंब भिजून गेलो होतो.त्याच अवस्थेत हात करुन टॅक्सी बोलावली.आधी मेन रोडवरचं जवळचं लाॅज गाठलं आणि मग पुढचे सगळे सोपस्कार!
आयुष्यातलं माझं हे पहिलंच ‘महाबळेश्वरदर्शन’! पण ते स्वप्नवत वगैरे नव्हे तर असं भयावह होतं!!तिथं बऱ्यापैकी सावरण्यातच पहिले दहा दिवस सरले ते पावलोपावली येणाऱ्या नित्यनव्या तडजोडी नाईलाजाने जमेल तितक्या अंगी मुरवतच. त्याही परिस्थितीत मी बऱ्यापैकी सावरु शकलो ते ब्रॅंचजवळच पाहिलेली दोन रुम्सची तात्पुरती छोटीशी भाड्याची जागा,घरगुती जेवणाची सोय आणि ब्रॅंचमधले माझे चांगले सहकारी यामुळेच!
रिपोर्टींगच्या पहिल्याच दिवशी श्री.रांजणे,आमचे हेडकॅशिअर यांनी आपुलकीने मला दिलेल्या आग्रहपूर्वक सल्ल्यामुळे त्यांनाच सोबत घेऊन मी आधी जवळच्याच दुकानातून रेनकोट,फुल स्वेटर आणि गमबूट यांची तातडीने खरेदी केली.या वस्तू ही तिथली दोन वेळच्या जेवणाइतकीच जीवनावश्यक गरज होती याबाबत तोवर मी अनभिज्ञच होतो.त्या नव्या पेहरावात मी प्रथम आरशात पाहिलं तेव्हा मी स्वत:लाच ओळखता न येण्याइतका कुणीतरी ति-हाईतच वाटलो होतो!
या जीवननाट्यातल्या माझ्या या नव्या भूमिकेचा सराव माझ्यासाठी खूप त्रासदायकच नाही तर आव्हानात्मकही होता.प्रतिकूल परिस्थितीतल्या अखंड व्यवधानांमुळे माझा होम सिकनेस मलूल होऊन मनातल्या एका कोपऱ्यात मान वर न करता पडून असायचा.घरगुती जेवणाची सोय घरापासून एरवी पाच मिनिटं चालत जाता येईल एवढ्याच अंतरावर.त्या काकूही स्वैपाक सुग्रास करायच्या,आग्रहानं वाढायच्या, पण कडकडीत भूक लागलेली असूनही घराबाहेर पडायलाच नको असं वाटायचं. कारण गमबूटाचं ओझं घेऊन छत्री सावरत चालताना भर दिवसाही पावसाच्या प्रचंड संततधारेत समोरचं कणभरही दिसायचं नाही.दोन वेळचं जेवण हे या अर्थानेही यज्ञकर्मच वाटायचं.थकून भागून रात्री अंथरुणावर पाठ टेकली की पहिला विचार यायचा तो जुलै महिन्याची पौर्णिमा जवळ येत असल्याचाच.अर्थात बदलीनंतर तिथं रिपोर्ट केल्यानंतर आम्हाला आठवडाभराची ट्रान्झिटलिव्ह मिळायची. कोल्हापूर रिजनल आॅफिसकडून पौर्णिमेच्या दरम्यानची आठ दिवसांची ती रजा मी नुकतीच मंजूरही करुन घेतली होती. त्यामुळे चारसहा दिवसांच्या घरपणाबरोबरच या पौर्णिमेचं नृ.वाडीचं दत्तदर्शनही विनाविघ्न होणार होतं हे खरं,पण त्यानंतरचं काय हा प्रश्न होताच. सगळंच अस्थिर, अशुध्द न् अवघडच वाटत राहिलं. महाबळेश्वरपासून नृ.वाडीपर्यंत जातायेता पंधरा तास जर लागणार असतील तर पौर्णिमेला जायचा अट्टाहास चालणार कसा? प्रत्येक पोर्णिमा काही रविवारीच नसणाराय.नसू दे. कांही झालं तरी यात खंड पडू द्यायचा नाही हे पक्कं ठरवूनच टाकलं. मग ते कसं जमवायचं याचे विचार सुरू झाले. त्यासाठी जे जे करावं लागेल ते ते कर्तव्यं आणि जबाबदाऱ्या यांच्याबाबतीत कोणतीही तडजोड न करता करायचं हा निर्धार पक्का झाला. त्यासाठी वर्षातल्या बारा कॅज्युअल लिव्हज् दर पौर्णिमेसाठीच राखून ठेवायच्या हे ठरलं.पण इथला हा धुवांधार पाऊस आणि नंतर लगेचच येणाऱ्या हिवाळ्यातली कडक थंडी यांचं काय ? तब्येत बिघडली,आजारपण आलं,ते रेंगाळलं तर? हा विचार मनात येताक्षणीच झटकून टाकला.’आपण कांहीही झालं तरी आजारी पडून रजा फुकट घालवायची नाही’ हे मनाला बजावून सांगितलं. प्रश्न मलाच पडत होते आणि त्याची अशी ठाम उत्तरंही मीच मला देत होतो.पण तरीही ‘दत्तमहाराज आपल्या श्रद्धेची कसोटी पहातात’ असं आईबाबा नेहमी म्हणायचे ती ‘कसोटी’ म्हणजे नेमकं काय याचा प्रत्यय मलाही येणार होताच. त्याला खऱ्या अर्थाने निमित्त ठरलं ते माझं हे महाबळेश्वरचं पोस्टींगच. कारण महाबळेश्वरचा अखंड धुवांधार पाऊस हा माझ्या नित्यनेमात मुख्य अडसर ठरणाराय असंच वाटतं रहायचं.कारण छत्री, रेनकोट, गमबूट हे सगळं असूनही हाकेच्या अंतरावरचं स्टॅन्ड गाठेपर्यंतही मी चिंब भिजृन जायचो. संपूर्ण प्रवासात ते ओले कपडे अंगावरच थोडे सुकत आले तरी नृ.वाडीला पोचल्यानंतरही त्यातला दमटपणा रेंगाळतच असायचाच.
या सगळ्या कसोट्या पार करीत पावसाळा कूर्मगतीने संपत चालला.आता सगळं सुरळीत सुरु राहील असं वाटत असतानाच प्रत्येक पौर्णिमेच्यावेळी नवीनच कसोटीचे क्षण अचानक माझ्यासमोर ‘आ’ वासून उभे राहायचे…!!
☆ हॉस्पिटलचं बील कसं ठरतं ? – लेखक : डॉ. सचिन लांडगे ☆ सुश्री सुनिता जोशी ☆
सध्या जळगाव मधल्या एका बँकर असलेल्या व्यक्तीची हॉस्पिटल बिलाविषयीची पोस्ट, आणि त्याला एका डॉक्टरांनी दिलेले उत्तर व्हायरल होतेय.
त्या निमित्ताने माझ्या एका जुन्या लेखातला काही अंश –
समाजात एकच गोष्ट वेगवेगळ्या दर्जाची मिळत असते.. पैसे देऊन आपल्याला जास्त दर्जाच्या सेवा घेता येतात.. चहा पाच रुपयाला पण मिळतो, आणि पाचशे रुपयाला पण मिळतो..! आपण आपल्या ‘शौक’नुसार आणि ‘खिशा’नुसार ठरवायचे की टपरीवरचा चहा प्यायचा की “ताज हॉटेल” मधला प्यायचा..
जसं ‘ताज’ला चहा पिऊन तुम्ही ओरड करू शकत नाहीत की आम्हाला लुटले म्हणून.. तसंच, ब्रीचकँडी किंवा फोर्टीस मध्ये जाऊन तुम्ही ओरड करू शकत नाही की आम्हाला लुटले म्हणून..
कुठल्याही ठिकाणी संभाव्य बिलाची साधारण पूर्वकल्पना देतात.. तुमच्या खिशाला परवडत नसेल तर जाऊ नका.. इतकं साधं गणित आहे..!
सरकारी हॉस्पिटलमध्ये अगदी पाच रुपयांचा केसपेपर काढला की गोरगरिबांचे कसलेही ऑपरेशन होते.. इतरही सेवाभावी संस्था आणि ट्रस्टची अनेक हॉस्पिटल अत्यल्प दरात उपचार देतात.. तिथेही आपण जाऊ शकतो..
पण लोकांना १. डॉक्टरही अनुभवी आणि बेस्ट पाहिजे असतो.. २. तो सहज आणि हवा तेंव्हा उपलब्धही पाहिजे असतो.. ३. हॉस्पिटलमध्ये एसी पासून गरम पाण्यापर्यंत आणि नर्सपासून स्वीपरपर्यंत सगळ्या सोयी अपटुडेट हव्या असतात.. ४. सगळ्या मशिनरी आणि तपासण्यांच्या सोयी एकत्र पाहिजे असतात.. ५. आणि बिल मात्र कमी पाहिजे असतं..!! नाहीतर डॉक्टर लुटारू..!! कसं जुळणार हे गणित.?
डॉक्टरांच्या अनुभवानुसार किंवा उपलब्ध सोयीसुविधां नुसार खाजगी हॉस्पिटलचे दर ही कमी अधिक होत असतात.. त्यात अमुक कोणी लुटतो किंवा कुणी समाजसेवा करतं अशातला भाग नसतो.. ज्या डॉक्टरला जिथंपर्यंत परवडतं तेवढं कमी तो करू शकतो..
दहा बेडच्या हॉस्पिटलसाठी नियमाने अकरा सिस्टर लागतात.. (एका वेळी तीन, आणि तीन शिफ्टच्या नऊ, साप्ताहिक सुट्टी आणि रजा यासाठी अतिरिक्त दोन), पण अकरा ऐवजी तीनच सिस्टर ठेवल्या, चार ऐवजी दोनच वॉर्डबॉय ठेवले, नॉर्मस् प्रमाणे सगळ्या मशिन्स न घेता फक्त अति गरजेच्या मशिनरी घेतल्या, आणि बाकीच्या सुविधा पण जेमतेमच ठेवल्या तर पेशंट बिल खूपच कमी ठेवता येतं.. याचा अर्थ असा नसतो की जास्त बिलिंग असणारे बाकीचे हॉस्पिटल्स पेशंटला लुटतात.. तिथं सुविधा आणि मशिनरी जास्त असतील म्हणून त्यांना तितक्या कमी पैशात उपचार किंवा ऑपरेशन करणे शक्य नसेल.. हाच त्याचा अर्थ असतो.. तुमच्या पेशंटला लागो अथवा न लागो, कुठल्याही दुर्घटनेसाठीची जी बॅकअप सिस्टीम असते, ती तर ready ठेवावीच लागते ना..!!
एक उदाहरण सांगतो, Defibrillator ही जीवरक्षक मशीन काही डॉक्टरच्या आयुष्यात एकदाही लागत नाही, पण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ते ठेवणं कम्पल्सरी आहे, आणि त्याची किंमत 2 ते 6 लाख रुपये आहे!! ते रोज चार्ज-डिस्चार्ज करणं अपेक्षित असतं आणि त्याची वॉरंटी दोन वर्षे असते..
अशा कित्येक गोष्टी असतात ज्यापासून समाज अनभिज्ञ असतो.. पण त्या गोष्टी डॉक्टरांच्या खर्चात पडत असतात..
समजा, गर्भाशयाची पिशवी काढायच्या ऑपरेशनला सगळ्या सुविधा असलेल्या हॉस्पिटलला कमीतकमी वीस हजार लागत असतील उदाहरणार्थ.. पण तेच ऑपरेशन, एखाद्या अजिबात सोयी सुविधा उपलब्ध नसलेल्या, कसल्याच मशिनरी उपलब्ध नसणाऱ्या, कामगारवर्ग पण पुरेसा नसलेल्या, आणि ऑपरेशनसाठी लागणाऱ्या धाग्यांपासून ते अँटिबायोटिक पर्यंत सगळं non-branded वापरणाऱ्या एखाद्या हॉस्पिटलला तेच ऑपरेशन दहा हजारात देखील परवडते..!
आता समाज असं म्हणतो की, तिथं तर दहा हजारातच ऑपरेशन होतं, मग आमच्या इथले बाकीचे हॉस्पिटल्स किती लुटतात.!!
दोन हॉस्पिटल मधील बिलिंगच्या या तफावतीसाठी खूप गोष्टी कारणीभूत असतात.. त्याची कल्पना जनसामान्यांना येणं शक्य नाही.. मोक्याच्या ठिकाणी असलेला हॉस्पिटलचा प्लॉट, बिल्डिंग, मेंटेनन्स, वीज, पाणी, स्टाफ, सरकारी फी आणि टॅक्सेस यांपासून ते तिथल्या वैद्यकीय सुविधा, मशिनरी, आणि वापरत असलेल्या इतर गोष्टी त्यात समाविष्ट असतात.. यावर बिलिंग ठरते.. या गोष्टींची कॉस्ट कमी जास्त झाली की बिलिंगमध्ये पण तफावत दिसते.. (तरी यात डॉक्टरांची फिस आणि त्यांचा अनुभव याची कॉस्ट नाही धरली..)
म्हणून, माझ्या स्वतःच्या आईचे ऑपरेशन असेल तर मी ऑपरेशन कोणते आहे, त्यासाठी किमान कितपत सुविधा लागतात आणि डॉक्टर कोण आहे यावर हॉस्पिटल ठरवेल.. दहा हजाराकडेही जाणार नाही आणि कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये जाऊन अडीच लाखही घालणार नाही..
हॉस्पिटल म्हणजे एक “स्मॉल स्केल इंडस्ट्री” असते.. जी चालवणं अत्यंत जिकरीचं असतं..
उदाहरणादाखल सांगतो, आमच्या इथल्या एका 50 बेडच्या अद्ययावत हॉस्पिटलचा मेंटेनन्स 26लाख महिना आहे.. पेशंट येवो अथवा न येवो, ‘बेड ऍक्युपन्सी’ कितीही राहो, मेंटेनन्स, बिलं, टॅक्सेस, भाडे आणि स्टाफ व ड्युटी डॉक्टरांच्या पगारापोटी महिन्याच्या तीस तारखेला 26 लाख तयार ठेवावे लागतात! त्या डॉक्टर मित्रानं मला सांगितलं, महिन्याच्या साधारण 22-26 तारखेपासून त्याचा प्रॉफिट सुरू होतो..
म्हणूनच “मेडिकलचं सगळं तर आम्हीच आणलंय, मग तरी हॉस्पिटलचं बिल इतकं कसं झालं?” असं म्हणणाऱ्यांना तर मला परत पहिलीपासून शाळेत पाठवावं वाटतं..
असो..
अजून एक, मला एकाने प्रश्न विचारला की, इथं हॉस्पिटलला माझे अपेंडीक्स चे ऑपरेशन झाले, मला 15000 खर्च आला, पण सरकारच्या MJPJAY योजनेत आमच्या शेजाऱ्याचे ऑपरेशन झाले, त्यात हॉस्पिटलला शासनाकडून 10,000/- च मिळतात असे ऐकलेय, मग मला पाच हजारांना लुटले का?
असं वाटणं साहजिक आहे.. पण
अशा योजनेत डॉक्टरनी ऑपरेशन करणे हे केवळ चालत्या गाडीत प्रवासी घेण्यासारखे आहे.. त्या ऑपरेशन च्या निमित्ताने हॉस्पिटलचे नाव ही होते आणि भविष्यात त्या पेशन्टचे इतरही ओळखीचे लोक तेथे ट्रीटमेंट ला येऊ शकतात..
अशा योजनांच्या ऑपरेशन च्या वेळी डॉक्टर औषधे आणि इतर साहित्य जरा कमी रेटचे वापरून (sub-standard म्हणत नाही मी) आपला”लागत खर्च” (investment cost) कमी करतात.. पण म्हणून सरसकट सगळ्यांसाठीच तसं करणं शक्य नसते..
गाडी चाललीच आहे तर एखादा प्रवासी फुकट नेणे किंवा कमी तिकिटात नेणे, हे जमू शकते.. पण सगळेच प्रवासी कमी तिकिटात नेणे जसे शक्य नसते, त्याप्रमाणेच एखादया योजनेतले ऑपरेशन्स कमीत करणे किंवा एखादे ओळखीतल्याचे किंवा गरीबाचे ऑपरेशन कमीत करणे डॉक्टरला जमते.. पण म्हणून सगळेच तसे करा म्हणत असतील तर ते शक्य नाही.. म्हणून अशा वेळी बाकीच्यांनी ‘लुटले’ वगैरे असं म्हणणं संयुक्तिक नाही.. एखाद्या खरेच गरीब असलेल्या पेशंटचे उपचार बरेच डॉक्टर maintenance cost च्या ही खाली, फक्त इन्व्हेस्टमेंट कॉस्ट विचारात घेऊन करत असतात, पण म्हणून सगळ्यांनाच डॉक्टरनी असं करावं असं जर समाजाचं म्हणणं असेल तर ते योग्य नाही..
एखादा बिल कमी करायला आला आणि तो खूपच गरीब वाटला तर डॉक्टर त्याचे काही बिल कमी करतात, याचा अर्थ त्यांनी ते आधीच वाढवून लावलेले नसते.. ते त्यांच्या नफ्यातून किंवा मेंटेनन्स कॉस्ट मधून पैसे कमी करत असतात.. पण सरसकट तसं करणं शक्य नाही, आणि आधीच पेशंट्स कमी असलेल्या हॉस्पिटलना तर ते शक्यच नाही..
बहुतेक सर्व डॉक्टर रोज काहीना काही रुग्ण फ्री तपासतात, किंवा पैसे नसतील तर ‘राहू दे राहू दे’ म्हणतात.. मला सांगा, समाजातला कुठला अन्य व्यावसायिक किंवा व्यापारी तुमची ओळखपाळख नसताना त्यांची फीस तुम्हाला ‘राहू दे, राहू दे’ म्हणतो बरं..?
माझ्या पाहण्यातले कितीतरी डॉक्टर्स फक्त औषधांच्या खर्चावर ऑपरेशन करून देतात, प्रसंगी औषधे सुध्दा आपल्या जवळची मोफत वापरतात.. खूपच गरीब असलेल्या पेशंटला स्वतःचे पैसे आणि क्रेडिट वापरून पुण्यामुंबईत ट्रीटमेंटची सोय करून देणारेही बरेच आहेत..
वैद्यकीय क्षेत्र हे असे एकमेव क्षेत्र आहे, ज्यात डॉक्टरला समाजसेवा करण्यासाठी घरदार सोडण्याची किंवा वेगळं काही करण्याची गरज नसते..
त्यांनी स्वतःचा व्यवसाय जरी सचोटीने केला तरी ती समाजसेवाच असते..
अजून एक कायम गाऱ्हाणं ऐकू येतं, डॉक्टर जुन्या ठिकाणी होते तर बिल एवढं एवढं यायचं, नवीन बिल्डिंगमध्ये गेले तर लगेच त्यांनी लुटणं सुरू केलं, लगेच त्यांनी त्यांचं बिलिंग वाढवलं..
मला एक सांगा, नवीन प्लॉट किंवा बिल्डिंग डॉक्टरला कुणी भेट म्हणून दिलीय का हो? बरं बिल्डिंगचं जाऊ द्या, नविन ठिकाणी गेल्यावर त्याचं वीज बिल वाढलंय, नवीन मशिनरी घेतल्यात, सुविधा वाढविल्यात, स्टाफ वाढवलाय.. ह्या सगळ्यामुळं त्याचा मेंटेनन्स पण खूपच वाढलाय..
मग ही वाढीव मेंटेनन्स कॉस्ट त्यानं बिलिंग मधून नाही घ्यायची तर कुठून घ्यायची बरं.? काय अपेक्षा आहे लोकांची? कुठून ऍडजस्ट करावा त्यानं हा वाढीव खर्च? कुक्कुटपालन वगैरेचा जोडधंदा त्यानं हॉस्पिटलला चालू करावा की काय.!! (इतर कुठला व्यावसायिक त्याच्या व्यवसायातील इन्व्हेस्टमेंट कॉस्ट आणि मेंटेनन्स कॉस्ट ग्राहकांकडून घेत नाही सांगा बरं!!)
लोकांच्या ह्या मानसिकतेमुळं नवीन ठिकाणी शिफ्ट झाल्यावर कितीतरी डॉक्टरांची प्रॅक्टिस कमी झालीये.. म्हणून, कितीतरी जण नवीन जागेत गेल्यावर वर्ष दोन वर्षे तरी ह्या भीतीपोटी बिलिंग वाढवत नाहीत, प्रसंगी तोटा सहन करतात..
माझे एक नातेवाईक मला म्हणाले, अरे त्या XYZ डॉक्टरनं मला तपासायला हात सुद्धा लावला नाही, माझे रिपोर्ट बघितले आणि गोळ्या लिहून दिल्या, आणि तपासणी फी शंभर रुपये घेतली..
मी त्यांना म्हणालो,
ह्या शंभर रुपयात त्यांच्या ओपीडीचे भाडे, किंवा बांधकाम खर्च असतो, वीज पाणी एसी आणि विविध प्रकारच्या परवानग्या, रिसेप्शनिस्टचा पगार असा इतरही खर्च त्यात असतो..
आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या पेनाच्या शाईत एक विशिष्ट प्रकारची माती मिसळावी लागते..
मग ते आश्चर्याने म्हणाले, कसली माती..?
मी म्हणालो- दोन मिनिटात तुम्ही सांगितलेल्या लक्षणांवरून तुमचा आजार ओळखून त्यावर तुमच्या वय वजन आणि रिपोर्टनुसार योग्य ते औषध लिहून देण्यासाठी जे शिक्षण आणि अनुभव लागतो, तो मिळविण्यासाठी त्यांनी जी आपल्या आयुष्याची माती केली आहे, ती माती मिसळावी लागते, तिची किंमत असते ती..!!
असो..
लोकांना वाटतं डॉक्टर खोऱ्याने ओढतात.. पण खोरे असण्याचे दिवस आता गेलेत.. प्रत्येक स्पेशालिटीत शंभरात दहाबारा जणच् चांगलं कमवित असतात, आणि समाजाच्या डोळ्यासमोर तेच येतात.. आणि मग जनरलाईझ्ड स्टेटमेंट होते की डॉक्टर लोक खोऱ्याने ओढतात म्हणून.. खरंतर निम्म्याहून अधिक जण हॉस्पिटलचा मेंटेनन्स आणि इन्कम याची सांगड घालायला झगडत असतात..
खरंतर महाविद्यालयीन मुलांच्या हॉस्पिटलला शैक्षणिक सहली काढायला हव्यात..
१. तिथलं कामकाज कसं चालतं, २.ट्रीटमेंट कशी असते, ३.डॉक्टर आणि स्टाफवर कसले ताण असतात, ४.तिथं मशिन्स कोणत्या कोणत्या असतात, ५.बिलिंग कसं असतं, ६.सगळी सिस्टीम कशी चालते.. हे पाहायला लावावं वाटतं..
… आणि निबंधाचे विषय पण “डॉक्टरसोबतचा एक दिवस” , “आयसीयु ड्युटीची एक रात्र” किंवा “मी डिलिव्हरीला मदत केली तेंव्हा..” अशा प्रकारचे असायला हवेत..
तरच जनता वैद्यक साक्षर होईल..
मित्रांनो, डॉक्टरांवर विश्वास ठेवा, त्यांना समजून घ्या.. तुम्ही ‘ग्राहक’ बनला, तर डाॅक्टर ‘दुकानदार’ बनतील.. तुम्ही “माणूस” समजून डॉक्टरांशी बोला, मग डाॅक्टर अवश्य “देवमाणूस” बनतील..!!
नात्यांची गुंफण आपल्या जन्मापासूनच सुरू होते. बाळाचं आणि आईचं नातं तर त्याही आधी आकारास येतं,पण आपण जन्म घेतो, तो कोणाचा तरी मुलगा /मुलगी म्हणून, आणि मग इतरही सगळी नाती आपोआपच जुळतात-काका, मामा, आजी-आजोबा, मावश्या, आत्या इत्यादि. या नात्यांच्या साथीने आपण लहानाचे मोठे होतो. त्यांच्या प्रेमाने, कौतुकाने फुलतो तर कधी आदर-धाकामुळे, स्वतःचा ढळणारा तोलही सांभाळतो. त्यांच्यापाशी हट्टही धरतो आणि लाडही पुरवून घेतो.
बाळपणीचे खेळगडी, शाळेतले सवंगडी, काॅलेजातले मित्र-मैत्रिणी, नोकरी-व्यवसायातला सहकारी, असा हा परिघ विस्तारतच जातो. प्रेम-विवाह असो अथवा ठरवून केलेला विवाह, जोडीदाराबरोबर वेगळेच रेशीम-बंध जुळतात आणि मग सासू-सासरे, दीर, नणंद, जाऊ इ. नात्यांचे पदरही जोडले जातात.
प्रेम आणि आपुलकीनं जोडलेली नाती आपोआपच दृढ होतात आणि आपलं भाव-विश्वही समृद्ध करतात. काही नाती मात्र आपण कर्तव्य भावनेने सांभाळतो, काही व्यवहार म्हणून तर कधी नाईलाजाने. पण आपल्या मनाची तार जुळणा-या व्यक्ती मात्र फार दुर्मिळ असतात.
अशी व्यक्ती ही ‘रक्ताची नातेवाईक’ असेलच असं नाही, पण ती आपल्याला सगळ्यात जवळची वाटते. ती मित्र-मैत्रिण, शेजारी – पाजारी, कार्यालयातील सहकारी /अधिकारी अथवा अन्य कोणत्याही क्षेत्रातील असू शकते. इथे वयाचा मुद्दा गौणच ठरतो. वैचारिक साधर्म्य, समान छंद/आवड, यापेक्षाही दुस-याला समजून घेण्याची वृत्ती, विश्वासार्हता, सह-संवेदना, या गोष्टी जास्त महत्त्वाच्या ठरतात. समोरच्याचं म्हणणं शांतपणे, लक्षपूर्वक ऐकणं, त्याला मोकळेपणानं बोलू देणं मग आपली प्रतिक्रिया देणं या बाबी प्रेम आणि विश्वास निर्माण करतात. काही वेळा प्रतिक्रिया नाही दिली तरी चालते, पण नीट ऐकून घेणं , जास्त आवश्यक असतं. त्यामुळे बोलणा-याचं मन मोकळं होतं, त्याच्या मनावरचा ताण हलका होतो.
या व्यक्तिशी आपला रोज संवाद / संभाषण असेलच, असं नाही. पण मनातलं खास सांगायला मात्र ती हक्काची वाटते. आपलं यश-अपयश, सुख-दुःख, फजिती सारं तिच्याबरोबर अनुभवायला, वाटून घ्यायला, आपल्याला आवडतं. कधी ‘दे टाळी’ म्हणून आनंद साजरा करायला तर कधी खांद्यावर डोकं ठेवून, अश्रू ढाळायलाही तीच व्यक्ती हवी असते आपल्याला. आपली दुखरी नस तिला अचूक सापडते आणि तिच्या बोलण्यात स्पर्शात, आपल्याला ‘आश्वासकता’.
या व्यक्तीचं अस्तित्वच आपल्याला मानसिक आधार देतं. ती आपल्याला समजून घेईल आपलं चुकत असेल तर चूक दाखवून, ती सुधारायला मदत करेल, हा विश्वास खूप मोलाचा असतो. मी जे काही बोलेन, ते तिच्यापाशीच राहील, ही खूण-गाठ मनाशी असते, म्हणून निःसंकोचपणे सारं तिच्यासमोर मांडता येतं. अशी एकतरी व्यक्ती आपल्या आयुष्यात असेल, तर आपल्यासारखे भाग्यवान आपणंच!
पण आजच्या या ‘आभासी’ जगात असं ‘ मैत्र’ हरवत चाललंय असं वाटतं. लहानांपासून थोरांपर्यंत, सारेच तणावयुक्त आयुष्य जगत आहेत. जगण्याच्या जीवघेण्या स्पर्धेत माणूस फरपटतोय, घुसमटतोय, हरवतोय, हरपतोय. कोवळ्या वयाची मुलं नैराश्यग्रस्त होऊन कधी वाईटमार्गाला जात आहेत तर कधी आयुष्याचा अनुभव घेण्याआधी जीवन संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना गरज आहे ‘मैत्र जीवाचे ‘ भेटण्याची.
चला आपणही कोणासाठी तरी ‘ मैत्र जीवांचे’ होण्याचा मनापासून प्रयत्न करूया ना! जिव्हाळ्याचं बेट बनून, ढासळणा-या मनांना उभारी देण्याचा ‘ खारीचा वाटा’ तरी उचलूया!
आज आषाढ अमावस्या! दीपपूजन! हिंदू धर्मात आपल्या परंपरा निसर्गाशी इतक्या छान जोडलेल्या आहेत की आपण आपोआपच निसर्गाशी एकरूप होतो! मृग नक्षत्रापासून सुरू झालेला पाऊस आषाढ महिन्यात स्थिरावलेला असतो. सगळीकडे सस्यशामल धरती नजरेस दिसत असते, त्यामुळे वातावरणात एक प्रकारचा उल्हास निर्माण होतो. काळोखाच्या रात्री जाऊन श्रावणाची झिमझिमणारी पहाट उद्यापासून सुरू होईल! कोरोनाच्या काळ्या छायेखाली सर्व देश चिंताक्रांत असताना आरोग्याची पहाट सुरू व्हावी म्हणून मोदीजींनी दीपोत्सव साजरा केला होता! नऊ मे रोजी रात्री पणत्या, मेणबत्ती, तसेच विविध प्रकारचे दिवे लावून एकात्मतेचा संदेश देण्यासाठी माननीय मोदीजींनी आवाहन केले होते. भारतीयांची मूळ मानसिकता ही श्रद्धेची आहे.
“तमसो मा ज्योतिर्गमय” अशी प्रार्थना करून हा अंधकार जाऊन प्रकाशाकडे वाटचाल करण्यासाठी आपल्याला बळ मिळू दे, ही या दीपोत्सवातील मुख्य भावना असते. त्यानिमित्ताने आपण दिव्यांना पुन्हा उजाळा देतो. पणती, समई, लामणदिवे, दीपमाळ अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण प्रकाशाची प्रार्थना करतो.. हे मनोभावे केलेले पूजन आपल्याला मार्गदर्शक होणार असते. त्यानंतर येणारा श्रावण महिना सणांची सुरुवात करतच येतो.
माझा नातू ,तेजस लहान असताना मी त्याच्या शाळेत बरेच वेळा जात असे. त्यांच्या शाळेत ” दीप अमावस्या” हा सण म्हणून साजरा करण्यात येत असे. शाळेच्या प्रवेशद्वारापासूनच वेगवेगळ्या प्रकारच्या दिव्यांची आरास केलेली असे. सर्व छोटी छोटी मुले त्या कामासाठी मदत करत असत. पूर्वीच्या काळापासून वापरात असलेल्या समया,झुंबरे, विविध प्रकारचे दिवे तसेच युद्धाच्या वेळी वापरण्यात येणारे पलिते, पेशवे कालीन दिवे, अशा सर्व प्रकारच्या दिव्यांची माहिती दिली जात असे. सगळीकडे वातावरण दिव्याच्या तेजात उजळून निघे. एखादा वर्ग फक्त अशा विविध प्रकारच्या पेटविलेल्या दिव्यांनी उजळलेला असे.तिथे इलेक्ट्रिसिटी चा अजिबात वापर केलेला नसे. लहान मुले उत्साहाने त्या दीपोत्सवात सामिल झालेली दिसत! अमावस्या असूनही वातावरण अगदी पौर्णिमेच्या चांदण्याप्रमाणे झगमगते दिसत असे!
आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक सणाला काही वैशिष्ट्यं असते.निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा संबंध विचारात घेऊन त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.पृथ्वी,आप,तेज,वायू, आकाश या साऱ्या पंचमहाभूतांचे स्मरण ठेवणे, पूजा करणे हे आपल्या संस्कृतीतील चांगल्या विचारांचे द्योतक आहे.. इतकेच काय तर प्रत्येक प्राणीमात्रांना आपण महत्त्व देतो.
दीप अमावस्येची रात्र अधिक झाकोळलेली असते.अंधाराचा प्रभाव जास्त असतो.पावसाची रिपरिप चालू असते..अशावेळी आपले मन नकळत निराशाजनक विचारांनी भरण्याची शक्यता असते,पण दीपोत्सव आपल्याला या नैराश्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो.अंधाऱ्या रात्री जाऊन आता तेजाची पहाट येणार आहे हेच जणू दीप सांगत असतो! दिवा हे उजेडाचे साधन आहे.आणि त्यामुळे मानवाची उन्नतीकडे वाटचाल चालू असते.
यानंतर येणाऱ्या श्रावणात दुष्टांचा संहारक कृष्ण जन्माला येतो,तर नवरात्रात देवीचे रूप हे दुष्टांचा संहार करणारी म्हणून येते.आणि नऊ दिवस दिवा लावून आपण नंतर दसरा साजरा करतो.दिपावली ला तर दिव्यांचे तेज झळाळून येते, कारण नरकासुराचा वध झालेला असतो. या सर्व गोष्टींतून असं लक्षात येतं की ,
दिवा किंवा तेज हे चांगल्या कडे वाटचाल करणारे आणि वाईट गोष्टींचा नाश करणारे असते! त्याची सुरुवात या दिव्याच्या अवसेपासून होते म्हणून ही दिव्याची अमावस्या महत्त्वाची मानली जाते!
या दिवशी आमच्याकडे कणकेमध्ये गूळ मिसळून , उकडून दिवे तयार केले जातात आणि हे कणकेचे दिवे तूप घालून खायला छान लागतात! मुलांनाही या दिव्याच्या खाद्य पदार्थांची मजा वाटते.अशी ही दिव्याची अमावस्या पुढील आनंदाच्या काळाची सुरूवात करणारी असते….
☆ गुरुपौर्णिमेची पार्श्वभूमी — महर्षी व्यास… — लेखक – डॉ. प. वि. वर्तक ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
आषाढी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा या नावाने ओळखली जाते. व्यास पौर्णिमा असेही तिला म्हणतात; कारण महर्षि व्यास मुनी हे सर्वांचे गुरु मानले गेले आहेत. व्यासांचा जन्म या तिथीला झाला अशी एक कल्पना आहे. पण ती उचित नाही; कारण व्यासांचा जन्म कधी झाला हे त्यांनी कुठेच नोंदलेले नाही.
व्यासांचा जन्म एका द्वीपावर झाला व ते वर्णाने काळे होते. म्हणून त्यांना कृष्ण द्वैपायन असे नाव मिळाले. परंतु पुढे त्यांनी वेदांची व्यवस्था लावली म्हणून त्यांना ‘व्यास’ ही पदवी मिळाली. पराशर ऋषींपासून मत्स्यगंधा सत्यवतीस जो पुत्र, अविवाहित अवस्थेत झाला तोच व्यास. शूद्र कोळिणीपासून जन्म झाल्यामुळे हा पुत्र जन्मतः शूद्र असला तरी स्वकर्तृत्वाने तो ब्राह्मण ठरला. ब्राह्मणांमध्येही वरिष्ठ ठरला. बालपणीच तपस्या आरंभून तो मुनिश्रेष्ठ, सिद्ध पुरुष झाला. सिद्धी मिळाल्यावर मातेस सोडून दूर जातांना त्याने सांगितले की ‘ तू स्मरण केलेस की मी लगेच भेटेन.’
व्यास हे महाभारत हा काव्यात्मक इतिहास लिहिण्यामुळे ख्याति पावले. अठरा पुराणेही नंतर त्यांनीच रचली अशी कल्पना आहे. महाभारत हा अतिविस्तृत एक लक्ष श्लोकांचा ग्रंथ लिहिणे योजले, तेव्हा इतके लिहिणार कोण हा प्रश्न पडला. गणपतीने लेखन करण्याचे काम पत्करले, पण त्याने अट घातली की तू सांगितलेले मी लिहीले पण तू पुढे लगेच सांगितले नाहीस तर मी काम बंद करीन. व्यासांनी ही अट घातली की तू समजल्याविना लिहिता कामा नये. अटीतटीने हा सामना चालू झाला. व्यास शीघ्र कवि असले तरी केव्हा तरी अडचण येई; तेव्हा व्यास गूढ श्लोक सांगत. त्यावर विचार करत गणपती बसला की हे पुढील रचना करीत. महाभारतात असे 8800 गूढ श्लोक आहेत.
महाभारतात असंख्य विषय मांडलेले आहेत. ते सगळे ज्ञानी व्यासांनी पचविलेले होते. नियोग पद्धतीने त्यांनी धृतराष्ट्र, पंडू, व विदूर यांना जन्म दिला. ते स्वतः शास्त्रज्ञ, सायण्टिस्ट होते. त्यामुळे त्यांनी गांधारीचा पाडलेला गर्भ घेऊन, त्यावर संशोधन करून शंभर कौरव निर्माण केले. क्रोमोसोम्सचे पूरे ज्ञान त्यांना होते, त्यामुळे त्यांनी ‘गुणविधी’ हे सायंटिफिक नाव त्यांनी त्या तत्त्वांना योजले. गुण व विधी म्हणजे कामे ठरविणारी ही तत्त्वे २३ असतात हेही त्यांनी नोंदलेले आहे. आज सायन्स क्रोमोसोम्स २३ आहेत असेच म्हणते. यावर अनुवंशिक रोग अवलंबून असतात हे व्यासांचे म्हणणेही सायन्सने आता मानले आहे. व्यासांना खगोलशास्त्रही अवगत होते. त्यांनी श्वेत, श्याम व तीव्र या नावाखाली युरेनस, नेपच्यून, प्लुटो या ग्रहांची स्थाने महाभारत युद्धसमयी कुठे होती ते नोंदलेले आहे. सर्व ग्रहांची स्थाने त्यांनी दोन पद्धतीने म्हणजे सायन-निरयन मानाने नोंदलेली आहेत. त्यावरून महाभारतीय युद्ध रविवार दि.१६ ऑक्टोबर ५५६१ इसवीसनपूर्व या दिवशी झाले हे मी निश्चित ठरवू शकलो.
अभिजित नक्षत्र गगनातून ढळले होते ही वैज्ञानिक सत्यकथा त्यांनी महाभारतात लिहून ठेवली आहे. असंख्य नक्षत्रे गगनात असूनहि केवळ एकाबद्द्ल ते सांगतात आणि आजचे विज्ञान नेमके तेच नक्षत्र इ.सनपूर्व १२००० वर्षे या काळी ढळले होते हे मानते, यावरुन व्यासांच्या दिव्य ज्ञानाची पारख होते. ‘जी हलत नाहीत ती नक्षत्रे ही व्याख्या असली तरी नक्षत्रेही हलतात’, असे व्यास म्हणतात, तेहि आजचे विज्ञान मानते आहे.
महाभारतयुद्धारंभी अमावस्या होती हे सांगून ते म्हणतात की सूर्य उगवताच दोन भागांचा झाला व किरण फेकण्याऐवजी ज्वाला फेकू लागला. आजचे विद्वान यावरुन व्यासांना मूर्ख ठरवू बघतात कारण सूर्याचे दोन भाग कसे होतील असे त्यांना वाटते. पण ग्रहणसमयी सूर्य खरोखरीच दोन भाग दर्शवितो, मध्ये काळी तबकडी व भोवती प्रभामंडळ. खग्रास सूर्यग्रहणसमयी खरेच प्रचंड ज्वाला सूर्यपृष्ठावरुन उफाळलेल्या दिसतात असे आजचे सायन्स सांगते.
‘व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्|’ व्यासांनी सारे जग उष्टे करुन टाकले आहे’, असे म्हणतात ते यावरुन सत्य ठरते. कारण व्यासांना ज्ञात नाही असे काहीच नाही. आजच्या काळातील सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ आईन्स्टाईन याने सिद्धांत मांडला की जो कुणी अतिवेगाने अंतराळात जाऊन परतला तर त्याचे आयुष्य वाढले असल्याचे आढळेल. नेमका हाच सिद्धांत व्यासांनी एका कथेतून सांगितला आहे की ककुद्मी आपली कन्या रेवती हिला घेऊन ब्रह्मलोकी वरसंशोधनासाठी गेला आणि २७ चतुर्युगांनी म्हणजे किमान २१६ वर्षांनी परतला, तरी तो जिवंत राहिला आणि रेवती तरुणच राहिली होती. तिचे लग्न बलरामशी लावले. प्रत्येक ग्रहावर काल भिन्न असतो हे तत्त्वहि व्यासांनी या कथेत सांगितले आहे.
परा व अपरा या दोनही विद्यांवर त्यांनी प्रभुत्व मिळविलेले होते. सिद्धीहि मिळवलेल्या होत्या. दिव्य दृष्टीची सिद्धी त्यांनी स्वतःच शिष्य संजय यास दिली होती; येवढे सामर्थ्य होते. त्यामुळे ते जगत्गुरु ठरले; त्यांचा मान राखण्यासाठी गुरुपौर्णिमेस व्यासपौर्णिमा मानतात.
♥ ♥ ♥ ♥ ♥
लेखक : डाॅ.प.वि.वर्तक – पुणे
प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈