मराठी साहित्य – विविधा ☆ आठवणीने विसरा… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

आठवणीने विसरा…  ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

परवाच माझी मैत्रिण सांगत होती कि तिच्या कोणालातरी अल्झायमर झालाय. आता त्यांना कोणी आठवत नाही.त्यामुळे त्या कोणाला अोळखत नाहित.•••• वगैरे वगैरे•••• आणि मग विसरणे हे एवढ्या भयंकर थराला जाऊ शकते असे कळल्यावर अंगावर सर्रऽऽऽकन काटा आला.

मग विचार आला का हा असा आजार निर्माण झाला असेल? मग त्यावर उपाय म्हणून स्मरणशक्ती वाढवण्याचे उपाय सांगितले जातात. बदाम खा•••• अक्रोड खा•••• वगैरे उपचार सांगितले जातात;आणि शेवटपर्यंत प्रयत्न केले जातात.पण शक्यतो अशा व्यक्तींना परत फारसे काहिच आठवत नाही.

आता डॉक्टर तज्ञ यावर अनेक उपाय सांगतात पण मला उगीचच एक विचार डोक्यात आला•••• मनुष्य केव्हा एखादी गोष्ट विसरतो? तर एखाद्या गोष्टीला खूप दिवस झाले असतील; त्या गोष्टींशी पुन्हा पुन्हा संपर्क येत नसेल तर मनुष्य ती गोष्ट विसरून जातो. जसे लहानपणी घोकून घोकून पाठ केलेली स्तोत्रे गाणी आपल्याला आता आठवत नाहित पण कोणी म्हणायला सुरुवात केली तर अधून मधून ते आपल्याला आठवू लागते. याच्या उलट जर आपण कधी कोणाशी भांडले असू एखाद्याने आपला अपमान केला असेल किंवा एखादी चांगली घटना घडली असेल तरी ती गोष्ट आपल्याला काही केले तरी विसरता येत नाही. कोणाचा प्रेमभंग झाला असेल तर ते प्रेम त्याला विसरणे शक्य नसते; आणि मग असे वाटले ज्या गोष्टी अापण अगदी मनावर घेतो ज्या गोष्टींमुळे आपल्या हृदयाला काळजाला थरार जाणवला असेल अशा गोष्टी आपण कधीच विसरत नाही.

मग ज्यांना विसरण्याचा आजार झालाय त्यांचे काय? तर ते लोक फार भावूक असावेत.प्रत्येक गोष्ट ते मनावर घेत असावेत. म्हणूनच सगळ्याच गोष्टी ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतात. मग हे लक्षात ठेवण्याचे पोते ताणून ताणून भरले की मग काही गोष्टी अगदी तळाशी जाऊन बसतात.काही गोष्टी  इतर गोष्टिंच्या मधे जाऊन बसतात.मग त्या गोष्टी कितीही महत्वाच्या असल्या तरी वेळेवर त्या आठवत नाहित. मग ही एक प्रकारची सवय लागून जाते; आणि त्याचे रुपांतर अशा भयंकर रोगात होत असावे.

त्यामुळे मला यातून मार्ग काढताना जाणवले जर आपण अगदी महत्वाचे आहे तेच लक्षात ठेवले आणि जे अनावश्यक आहे,ज्याने आपल्याला त्रास होईल अशा गोष्टी जाणिवपूर्वक विसरल्या तर? म्हणजे कोणी आपल्याशी भांडले असेल कोणी आपल्याला त्रास दिला असेल तर असे प्रसंग आपण विसरायला शिकले पाहिजे. म्हणजेच जाणिवपूर्वक किंवा आठवणीने विसरणे हा रोग नसून ती एक कला आहे. आणि हिच कला प्रत्येकाने अंगिकारायला पाहिजे असे वाटते.

म्हणजे बघा हं•••• जर आपण ज्या गोष्टी महत्वाच्या नाहित त्रासदायक आहेत अशा गोष्टी पुढच्या क्षणी विसरायचे ठरवले तर मनामड्ये चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायला जागा शिल्लक राहिल. एक वाईट गोष्ट विसरली कि पुढच्या दहा चांगल्या गोष्टिंसाठी जागा होईल. मग चांगल्या गोष्टी आठवत राहिल्या तर मन प्रसन्न राहिल. अर्थातच त्यामुळे आरोग्य चांगले राहिल••••

आपण आपल्या घरातूनही जुने फाटके कपडे काढून फेकून देतो तेव्हा नवे चांगले कपडे ठेवण्यासाठी कपाटात जागा होते. घरातील जुन्या वस्तू जेव्हा बाहेर काढतो तेव्हा नव्या वस्तूंचा उपभोग आपल्याला घेता येतो•••• तसेच आपण आठवणीने काही गोष्टी विसरू या.म्हणजे चांगल्या गोष्टी आपोआपच लक्षात राहतील.मग म्हणूया खरच विसरणं ही एक कला आहे•••• ती आत्मसात करू या•••••

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग १७ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १७ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- भावाचं पत्र वाचून पुन्हा उलटसुलट विचार मनात गर्दी करू लागले.आईने लिहिलेला मजकूर वाचून तर मी हळवाच होऊन गेलो.बाबांच्या आठवणीने मी व्याकुळ झालो. अखेर भावनेच्या आहारी जाऊन का होईना पण मी मन घट्ट केलं आणि आता ‘स्टेट बँक’ हेच आपलं नशीब हे स्वीकारलं. युनियन बँक सोडायचा निर्णय पक्का झाला. पण तरीही मनाला स्वस्थता नव्हतीच.मी हातातल्या इनलॅंडलेटरची घडी घालू लागलो आणि लक्षात आलं, त्याला आत दुमडायचा जो फोल्ड असतो तो उलटा धरून त्यावर गिजबीट अक्षरात काही मजकूर दिलेला आहे. हे बाबांनी तर लिहिलं नसेल? हो नक्कीच. थरथरत्या हाताने लिहिल्याचं स्पष्ट जाणवत होतं. प्रयत्नपूर्वक एक एक अक्षर जुळवायचा आटापिटा करून ते वाचलं.त्यातून जे हाती लागलं ते मात्र खरंच लाखमोलाचं होतं!)

घाईघाईने कशीबशी लिहिलेली फक्त दोन वाक्यं होती ती.प्रयत्नपूर्वक अक्षरं जुळवत मी ती वाचली आणि अंतर्बाह्य शहारलो!

‘दत्तकृपेचा प्रसाद म्हणून मिळालेली सध्याची नोकरी काही झालं तरी सोडू नकोस. तिथेच तुझा उत्कर्ष होईल. ‘

या आधीच्या अस्वस्थ मनस्थितीत ‘बाबा हिंडते-फिरते असते तर त्यांच्याशी बोलता तरी आलं असतं.त्यांनी योग्य तो मार्ग नक्कीच दाखवला असता’ असं उत्कटतेनं वाटत राहिलं होतं. ते शक्य नाहीय हे माहित असल्याने मन अधिकच सैरभैर झालं होतं. आणि माझी ही अस्वस्थता नेमकी जाणवल्यासारखं बाबांनी मी न विचारताच माझ्या मनातल्या प्रश्नाचं नेमकं उत्तर मला दिलं होतं. मी निश्चिंत झालो. युनियन बँक न सोडण्याचा निर्णय घेतला. खूप दिवसानंतर प्रथमच चार दिवस रजा घेऊ घरी गेलो. मी घेतलेल्या निर्णयाने आई आणि भाऊ दोघांचा खूप विरस झाला होता. आई कांही बोलली नाही पण भाऊ मात्र म्हणाला,

“ही नशिबाने मिळालेली सोन्यासारखी संधी तू सोडायला नको होतीस. तू प्रोबेशन पिरिएडला घाबरून हा निर्णय घेतलायस.हो ना?”

“तसं नाही…पण..”

“मग कसं?”

मी काही न बोलता बाबांकडे पाहिलं. ते शांत झोपले होते. मी बॅग उघडली. बॅगेतलं इन्लॅंडलेटर काढून त्यातला बाबांनी लिहिलेला मजकूर भावाला दाखवला. त्याने तो वाचला आणि अविश्वासाने आईकडे पहात ते पत्र तिच्या हातात दिलं. आईनेही ते वाचलं. काय समजायचं ते समजली. एकवार अंथरुणावर शांतपणे झोपलेल्या बाबांकडे पाहिलं आणि ते पत्र मला परत दिलं.

“माझं लिहून झाल्यावर मी ते चिकटवणार तेवढ्यात यांनी मला थांबवलं होतं. ‘मी वाचून देतो मग टाक’असं म्हणाले होते.

आम्ही खरंतर त्यांना विनाकारण त्रास नको म्हणून त्याबद्दल काही बोललोही नव्हतो. तरीही आमच्या गप्पातून ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं असणार नक्कीच. म्हणून तर जागा मिळाली तेवढ्यात घाईघाईने लिहिलंय हे सगळं जमेल तसं. होतं ते बऱ्यासाठी म्हणायचं दुसरं काय?”

आई असं म्हणाली खरी पण घडलं होतं ते फक्त बऱ्यासाठीच नव्हे तर खूप चांगल्यासाठी होतं याची प्रचिती आम्हा सर्वांना लवकरच आली.

स्टेट बॅंकेतली नोकरी युनियन बॅंकेच्या तुलनेत पगार,इतर सवलती, प्रमोशन्सच्या संधी,मुंबईतून बदली मिळायची अधिक शक्यता अशा सर्वच दृष्टीने निश्चितच आकर्षक होती.तरीही ”दत्तकृपेच्या प्रसाद म्हणून मिळालेली सध्याची नोकरी काही झालं तरी सोडू नकोस. तिथेच तुझा उत्कर्ष होईल ‘ या अंत:प्रेरणेने लिहिलेल्या बाबांच्या शब्दांत लपलेलं गूढ मला योग्य मार्ग दाखवून गेलं होतं.कालांतराने यथावकाश ते गूढही आपसूक उकललं.

माझ्या कन्फर्मेशननंतर लगेचच झालेल्या वेज रिव्हिजनच्या एग्रीमेंटमधे आमच्या बँकेची प्रमोशन पॉलिसी पूर्णतः बदलली. नोकरीची तीन वर्षे पूर्ण होताच प्रमोशनसाठी लेखी परीक्षा आणि इंटरव्यू देण्याचा मार्ग आमच्यासाठी खुला झाला होता. त्यामुळे ती माझ्यासाठी सुवर्णसंधीच ठरली. तीन वर्षे पूर्ण होताच मीही प्रमोशन टेस्ट दिली आणि लगेचच मला पहिलं प्रमोशनही मिळालं.एवढंच नव्हे तर पुढची वेगवेगळ्या

रॅंकची सगळी प्रमोशन्सही मला प्रत्येकवेळी फर्स्ट अटेम्प्टलाच मिळत गेली. त्याही आधी बेळगाव बँक, मिरज स्टेट बँक यासारख्या बँका युनियन बँकेत मर्ज झाल्याने आमच्या बँकेचे ब्रॅच नेटवर्कही सांगली कोल्हापूर भागात अनपेक्षितपणे प्रचंड विस्तारलेलं होतं. त्यामुळे मला लगेचण या भागात बदली तर मिळालीच शिवाय प्रमोशन्सनंतरही प्रत्येक वेळी सोईची पोस्टिंग्जही जवळपासच मिळत गेली. स्टेट बँकेत राहिलो असतो तर हे इतकं सगळं इतक्या सहजपणे नक्कीच मिळालं नसतं.

हे सगळं ज्यांच्या प्रेरणेने शक्य झालं ते माझे बाबा मात्र हा सगळा उत्कर्ष पहायला होतेच कुठे?

बाबांनी इनलॅंडलेटरमधे लिहिलेला तो दोन वाक्यांचा मजकूर हाच आमचा अखेरचा संवाद ठरला होता. कारण त्यानंतर लगेचच सप्टेंबर १९७३ मधे ते गेलेच. जाताना त्यांची सगळी पूर्वपुण्याई आणि आजही मला दिशा दाखवणाऱ्या त्यांच्या मोलाच्या आठवणी हे सगळं ते जाण्याआधी जणू माझ्या नावे करून गेले होते!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बकुळ हार ☆ सुश्री गौरी बागलकोटे ☆

🔅 विविधा 🔅

🌸 बकुळ हार 🌸 सुश्री गौरी बागलकोटे ☆

आताच फेसबुक चाळत असताना मी एका ज्वेलर्स ची जाहिरात पाहिली. त्यात त्यांनी एक दागिना प्रमोट केलेला — बकुळ हार

मनात आले कोणत्याही प्रकारात म्हणजे १ग्रॅम, बेंटेक्स,चोख सोंने यात  बकुळ हार मिळेल या जमान्यात, पणं खरी बकुळी मिळण कठीण झाले आहे. नाही म्हणायला कोल्हापूरच्या अंबाबाई देवळासमोर मिळतात बकुळीचे गजरे,  पणं लोकली फारशी पहायला नाही मिळत बकुळी. झाडे पणं कमी झाली. रातराणीच कौतुक सगळ्यांना. ती असते कुंपणावर. पण बकुळ दुर्मिळ झाली. शहरातून हद्दपार झाली जवळजवळ. बांधावर शेताच्या किंवा रस्त्याकडेला एखादे बकुळ दिसते. नाहीतर नवग्रहांची, किंवा नक्षत्र  झाडे असतात तिथे हमखास सापडेल. बकुळीच्या झाडाखालून गेल्यावर तो सुगंध पूर्ण श्वासात भरून घ्यावासा वाटतो. तो बाकी फुलांना नाही.

लहानपणी आम्ही एवढे बिझी नसायचो हा क्लास झाला की दुसरा तो झाला की तिसरा. त्यामुळे निसर्ग, सण साजरे करायला थोडा वेळ असे लहान मुलांना.

हादगा जवळ आला की विविध फुले शोधत मुली फिरत. त्यात गुलबक्षी विविध रंगात सजलेली, पिवळा, पां ढरा,अन् गुलबक्षी रंग. इतकी सुंदर फुले रस्त्याच्या कडेला उगवत अतिशय नाजूक, कमी आयुष्य असलेली फुले. दोन रंगाच्या कॉम्बिनेशन मधे ही उगवतात. जसे की पांढरा लाल, लाल पिवळा खुप छान दिसतात. त्याची देठे नाजूक असतात. एका विशिष्ठ कोनातून वाकवावी लागतात, नाहीतर लगेच तुटतात. देठाच्या शेवटी हिरव्या रंगाचा गोल असतो. असे फुल खुप छान रंगांनी सजलेले.

आता हादगा कमी झाला. मुलींना या सर्व गोष्टीत फारसा इटरेस्ट राहिला नाही. रस्त्याच्या कडेला ही फुले अजूनही दिसतात, अन् भूतकाळात घेऊन जातात. त्या फुलांची केलेली तीन पेडाची वेणी अजून आठवते, फुले दिसली की ती तोडून वेणी करावीशी वाटते. आम्ही मुलीचं अस नाही, मुल आमचे बालमित्र आम्हाला ह्या वेण्या करायला फुले तोडून आणुन देत असत. आणि आम्ही बसून त्या वेण्या गुंफत असु. मधे कुठे वेणी सुटत आली तर आमच्या मैत्रिणी मित्र सांगत इथे सुटत आलाय. मग कुणीतरी नाजुक हातानी सावरून वर घेत असे. त्यात मोडलेल फुल काढून आम्ही ती वेणी परत गुंफत असु. आणि त्या फुलाचा खालचा  हिरवा गोल भाग हिरवे मिरे म्हणून भातुकली मधे घेत असु.

अजरणीची फुले, याला बोलीभाषेत हद्ग्याची फुले म्हणतात. मला वाटत होत ह्याची झाडे संपली. पण नाही बऱ्याच कॉलेज कॅम्पस मध्ये ही झाडे अजून तग धरून आहेत. त्याच्या पाकळ्यांच्या पिपण्या फार आनंद देवुन जात. मी कुणाच्या गालावर फोडली, मी कुणाच्या कपाळावर फोडली. याची स्पर्धा लागायची,  त्यावरून चिडाचीडी, भांडाभांडी. सॉलिड मजा यायची. तू मला टिचकी मारलीय काग …काग.??😊

ह्याची पणं वेणी होते. भिजकी फुले असतील तरच याची वेणी मोडते. नाहीतर खुप मोठी वेणी होते. माझ्या हत्तीचा फोटो खुप मोठा म्हणजे पा टा एव्हढा होता. त्याला पुरेल एवढा हार व्हायचा. भानुंच्या वाड्यात हे झाड होत. आता नाही आहे. पण परवा सांगलीला जाताना वालचंद च्या कंपाऊनडला संपूर्ण  अजरणी ची झाडे आहेत. तेव्हा अजून आजरणी अजून जिवंत आहे, हे मला पटले.

भानुवाड्यात पांढरा चाफा पणं होता. त्याच्या अंगठ्या फार पॉप्युलर होत्या.  पाकळी बारीक चीमट्यानी भोक पाडायचं अन् ती पाकळी देठात ओवायची, सगळ्या पाकळ्या झाल्या की झाली अंगठी तयार.

असे हे लहानपणी चे दागिने.

गोरे वाड्यात, (आता कळल त्याला गोरेवाडा म्हणतात) बकुळीच झाड होते. जेरे बाईंच्या शाळेत जाताना मोठ्ठं बकुळी झाड होतं. शाळेला जाता येता आम्ही सगळे ही फुलं वेचायचो. कुणी मुठीत घट्ट पकडुन फुल घरी घेवून यायचो. कुणी मुठीचा वास घ्यायचा, पुन्हा, पुन्हा घेत राहायचा. कुणी ही फुल देवाला घालण्यास घरी घेवून येत, न वास घेता. कुणी वरून फुल पडल की पडल उचलून तोंडात घालत. फुलातील मध चोखायला. अशी किती मिळाली त्यावर आनंद द्विगुणित व्हायचा. हे सर्व शाळेतून येताना. कारण घरी जाताना आम्हाला  कोणी घ्यायला येत नसे.  कुणी ना कुणी आम्हाला सोडायला यायचे. तेंव्हा नुसता सुगंध श्वासात भरून घेत असु. जो आता फार दुर्मिळ झाला आहे.

बकुळ हार सोन्याचा किंवा इतर कोणत्याही धातूचा सध्या फार चलतीत आहे. ज्याचा आकार तेव्हडा बकुळीसारखा आहे. दिसते बकुळ फुल पणं त्यात तो मनात भरणारा सुगंध मात्र हरवलेला आहे…….

© सुश्री गौरी बागलकोटे

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हम बोलेगा ईमोजी बेहेतर बोलता है ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

हम बोलेगा ईमोजी बेहेतर बोलता है ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

काय मंडळी खरे आहे ना? माझा तरी अनुभव तसाच आहे. अपना हाल एक ईमोजी सबको बिना बोले बताता है| तर झाले असे,माझी मैत्रीण ( जी सतत ईमोजी मधून बोलत असते ) तिची चूक नाही बरं का.एकदा ती आजारी होती. बरे सांगावे कसे ?ग्रुप वर मेसेज केला तर कोणी विचारपूस करेना मग तिने 🤕 ईमोजी स्टेटसला.आणि घोळच झाला.सगळ्यांना वाटले तिला अपघात झाला किंवा डोके दुखत आहे.मग तशी चौकशी सुरू झाली.आणि सर्दी झाली आहे सांगता सांगता खरेच डोके दुखी झाली.पण इतक्या चौकशा झाल्या म्हंटल्यावर स्वारी ईमोजी माय झाली की.

हे ईमोजी महत्व माझ्या काही डोक्यात बसेना.तरी पण बघू प्रयत्न करून म्हणून तिच्या पावलावर पाऊल प्रमाणे ईमोजी वर ईमोजी ठेवून मी पण ईमोजी धर की टाक करते आणि हसे करून घेते.काय होते कोणी काही म्हंटले की पोस्ट आवडली की मी कोणताही भेद न करता ( स्त्री पुरुष ) दिलून टाकते.सांगायचे इतकेच असते,पोस्ट आवडली.आणि छान वाटले.पण त्यातून नसती आफत ओढवते ना.🫢 आणि काय चुकले कळतच नाही.🤦🏻‍♀️

मग एक समजले ईमोजी जसे शब्दा वाचून बोलतात तसे चुकीचे ईमोजी फार धोकादायक 🫣.एकदा अतीच फजिती केली ना या ईमोजी रावांनी.एकदा गृपवर कोणासाठी तरी श्रद्धांजली अर्पण केली होती.मी पण घाई घाई 😢 हे पोस्टवून टाकले.खूप सारे रिप्लाय आले होते त्यात सर्वांनी माझी चांगलीच खिल्ली उडविली होती.मग लक्षात आले रडक्या 🥲 ईमोजी ऐवजी चुकून 😂 हे साहेब तेथे घाई घाई गेले होते.😭

खरी गंमत येते 🥰😘 💞  हे ईमोजी राव पोस्टल्यावर.प्रेमात बुडालेला 🥰 हा जास्तच डेंजर.😘 (लाल टेंगुळ – एका मैत्रिणीने याचे केलेले नामकरण ) हा लहान मुलांना चालेल,मैत्रिणीला चालेल.पण नको तिथे घाईने/चुकीने गेला तर? जिथे गेला तिथे 🕺🏻आनंदी आनंद.आणि आपली कोंडी. आणि 🥰 (तीन टेंगळे – कोणाला तरी खरीच 🤕 आणेल) हे म्हणजे एकदम चाटून पुसून काम.🫢🤫

हे सोपे कसले हे तर माझ्या सामान्य किंवा बाळ बुध्दीला एकदम अवघड 😇 काम.बरे कतीही काळजी घेतली किंवा उसनी हुशारी आणली तरी ही भाषा काही जमत नाही. कारण भलभलते  गैरअर्थ काढण्यात समोरचे पटाईत (अगदी आपली चूक असली तरी 🙆🏻‍♀️).मग काय 🤦🏻‍♀️पुन्हा चूक आपलीच असल्याचे पुरावे सादर केले जातात.👊🏻

आणि हो हे झुके भाऊ कधी बदल करतील सांगता येत नाही.डोळे झाकून ईमोजी घाई घाई पोस्टावा तर तिथे वेगळाच अपरिचित (अर्थ न कळलेला) ईमोजी राव येऊन बसलेला असतो.आणि आपल्याला फजितून टाकतो.

असे अनुभव जमा करत करत ईमोजीराव पोस्टताना फार काळजी घेते पण तरीही भिक नको पण कुत्रे आवर या प्रमाणे कोणीतरी म्हणतेच, टाईप कर फोन कर पण ईमोजी आवर मग मी जास्तच दक्षता घेते.अगदी गुगल बाबां कडून सगळी माहिती घेते.अर्थ समजून घेते.पण काहीतरी घोळ होतोच आणि शिंगरू मेलं हेलपाट्याने या प्रमाणे मी मरते हे चुकीचे इमुंचे (लाडा चे नाव हो) अर्थ किंवा अनर्थ निस्तरताना.

कदाचित हे चुकीने टाकलेले किंवा घाईने पोस्टलेले मेसेज यातून गैरसमज किंवा गैरअर्थ निघू नयेत या साठीच एडिट किंवा डिलीट चे रबर दिले असावे. व माझ्या सारख्या चुकून पोस्टणाऱ्या लोकांची सोय केली असावी.

पण मी दमून जाते हो हे निस्तरताना.आणि ठरवते काही 🙃🙂 उलट सुलट होण्या पेक्षा 🤫 चूप बसावे.

आता हे शेपूट फारच लांबत चालले.तर सांगायचे इतुकेच की शब्दावाचून बोलणारे ईमोजी चुकले तर शब्दांच्या पलीकडले अनर्थ करतात.त्या मुळे हे भाऊ नीट अर्थ समजल्या बिगर पोस्टू नयेत.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “बाप” एक माणूस….!! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “बाप” एक माणूस….!! –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

एकदा “बाप” ही उपाधी मागे लागल्यावर सगळ्या मृदु, कोमल भावनांची मक्तेदारी बायकोच्या नांवावर करून हा माणूस कधी निर्विकार, मख्ख तर कधी कर्तव्य-कठोर  मुखवटा धारण करून बसलेला एक खडक बनतो. 

पोटच्या पोरांसाठी सतत कष्ट करणारा, त्यांच्यासाठी अनेक  गोष्टी चुपचाप सहन करणारा, त्यांची कोड- कौतुकं  पुरविण्यासाठी वेळप्रसंगी  जीवाचा आकांत करणारा बाप, तसा आईच्या थोरवी पुढे दुर्लक्षितच  पण  त्याचे त्याला  कधीच वैषम्य वाटत नाही. जाहीर कौतुकाची तर त्याला  कधी अपेक्षाही नसते. आपली लेकरं आपल्यापेक्षा मोठी व्हावीत  ह्या एकाच ध्यासापोटी  आपला ‘बापा’चा कठोर मुखवटा सांभाळत त्याचे आयुष्य सरत असते….

पण एका समाधानाच्या क्षणी, हा मुखवटा गळून पडतो… अंतरंगामध्ये झुळुझुळु वाहणाऱ्या मायेच्या निखळ पाण्याचा थोपवून   धरलेला झरा,  मुलांच्या कर्तृत्वाची झेप पाहतांना जेंव्हा त्याच्या डोळ्यांचे बांध फुटून वाहू लागतो तेंव्हा त्याच्याच लेकरांना उमगतं की अरे, आपला बाप हाच खरा आपल्या आयुष्यातला “बाप माणूस” आहे ….!

अशा सगळ्या “बाप-माणसांना” त्रिवार  वंदन..!!

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रुद्र मंथन… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

🌸 विविधा 🌸

☆ रुद्र मंथन…  ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

आयुष्य हे एक, न उलगडणार गुपित! हा कोष्टकाचा खेळ! सारीपाटाचा डाव! प्रत्येकाला खेळ मांडण्याची मुभा आहे. फासे टाकणे त्याच्या हातात असले तरी, नियतीचा डाव वेगळाच असतो. भगवान शंकर पार्वतीने निर्माण केलेला खेळ, आजतागायत चालू आहे. फक्त खेळणारे भिडू  बदलत असतात. सारीपाट तोच आहे. हा खेळ ज्यांना जमला तो आणि ती रंगात गुंग होतात, रमुन जातात आणि येणाऱ्या पिढीला हा डाव सुपूर्द करतात.  प्रारब्धाचे फासे ठरलेले असतात. खेळणाऱ्याला वाटतं आपण चांगल खेळत असतो. सारीपाटाला कट्टी असते (फुली मारलेली जागा ) त्यात एखादी सोंगटी गेली की तिला मारता येत नाही! ती बिनधास्त राहते. तसेच काही खेळाडू,कट्टीत राहून आयुष्याचा खेळ खेळतात. तस नियतीने बुहतेक ठरवलं असावं. काहींना खेळात सुंदर फासे पडतात, तर काहींना उलटे फासे पडतात. काहींचा डाव रडीचा असतो तर, काही जण खिलाडू वृत्तीने घेतात. प्रत्येकाला डाव खेळावाच लागतो. त्याशिवाय सुटका नाही. हे एक प्रकारचे युद्ध कौशल्यच म्हणावे लागेल.

सोंगट्या कोणत्याही रंगाच्या असोत, खेळाचे कौशल्य आणि तंत्र मंत्र अंगी सात करावे लागतात. काहीजण हा खेळ अर्धवट सोडून उठतात! खेळ म्हटल्यावर हार जीत पण स्वीकारवी लागतेच. त्याचे कडू गोड घोट पचवावे लागतात. खेळातील परिस्थिती कशी असेल सांगता येत नाही. त्या परिस्थितीला अनुसरून नाईलाजाने, फासे टाकावे लागतात. खेळात बाहेरचे कमी पण आतलेच शत्रू जास्त असतात. त्यांना सदैव सोबत घेऊनच हा बुद्धिबलाचा डाव आखावा लागतो.

काहीवेळा  आयुष्य हे   “समुद्र मंथन “आहे असच वाटतं! काळाचा वासुकी ( दोरी ) आयुष्याच्या मेरू पर्वताला गुंडाळून समुद्राला ढवळून काढतात. वासुकीच्या तोंडा कडील भाग हा पुरुषाकडे तर, शेपटीचा भाग स्त्रिया कडे! आयुष्याचे रुद्र मंथन करण्यात किती पिढ्या गेल्या हे त्या जगतपित्यालाच माहित! प्रत्येक जण हा सुख दुःखाचा खेळ खेळत जीवनाच सार्थक करून घेत असतात.

पण ह्या समुद्र मन्थनातुन सुख आणि दुःख ह्या खेरीज कोणतेही रत्न सापडत नाही. वेदना व्यथा ह्या सुखातूनच उत्पन्न होत असव्यात का  ? हे न समजणारे कोडेच! प्रत्येक जण ह्या सुख दुःखाच्या विहिरीत उडी मारतोच! रुद्र मन्थनाचा हा खेळ अव्यांहत पणे चालू आहेच.

प्रकृती पुरुष हेच आदम ईव्ह  वाटू लागतात. येथूनच आनंदाचे सफरचंद खाण्यात  मशगुल होतात. भोग आणि उपभोग ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू  ! स्त्री पुरुष  म्हणजेच जग का ?

स्त्रियांच्या वाट्यालाच भोग आणि पुरुषांच्या वाट्याला उपभोग!  हा कसला न्याय!

ही अशीच का सृष्टी रचना.

स्त्रियांचे दुःख स्त्रियानाच माहित. मग तो पुरुष स्त्री रोग तज्ञ डॉक्टर असला तरीही त्याला त्या वेदना कश्या कळणार! भोग उपभोगचे खेळ हे आनादी काळापासून चालू आहेत. वेदना व्यथा आहेत, म्हणून त्याला काळाचे मलम आहेच. प्रकृतीचा सोशिक पणा निसर्ग सृष्टीला मान्य होता, असं म्हणावे लागेल.

आजच्या युगात स्त्री शक्ती जागृत झाली, स्त्री शक्ती खूप पुढे गेली. प्रत्येक क्षेत्रात ह्या शक्तीने आघाडी घेतली व समाजाचा मनाचा केंद्रबिंदू झाली. तरीपण तिच्या वाट्याला आलेल दुःख सहजपणे पचवून पुढे जात राहिली.

असं असलं तरी स्त्री व पुरुष हे घटक एकमेकांना पूरक होत, काळाच्या यज्ञात समिधा अर्पण करीत हा जगण्याचा यज्ञ अखंड सुरूच ठेवला. हाच भातुकलीचा खेळ, सारी पाटात केव्हा रूपांतरीत होऊन,  त्याच रुद्र मंथन कस झालं हे कळत पण नाही. आयुष्य हे असच असत का?  सुख दुःख , हार जीत कुणाचीही होवो. हा जगण्याचा मंत्र सारी पाट डाव असो वा रुद्र मंथन हे कुणास चुकले आहे का ?

भातुकलीचा खेळ कसा  मांडावा, सारी पाटात फासे कसे फेकावे, रुद्र मंथन हा आयुष्याचा आनंदाचा क्षण समुद्र मंथन नाही का वाटतं हा जगण्याचा यज्ञ त्यात पडणाऱ्या अहुत्या कळत न कळत  काळाच्या पडद्या आड होत राहतात! हेच तर समाजाचे जगणे आहे देणे आहे.

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उगवतीचे रंग – मी का लिहितो ? ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

उगवतीचे रंग – मी का लिहीतो ? ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

मध्यंतरी मला कोणीतरी हा प्रश्न विचारला होता की मी का लिहितो ?  हा प्रश्न म्हणजे मी अन्न का खातो, मी पाणी का पितो, मी श्वास का घेतो असे विचारण्यासारखे आहे. मी का खातो, का पितो आणि का श्वास घेतो या तीनही प्रश्नांचे उत्तर एकच आहे. आणि ते म्हणजे जगण्यासाठी. जगण्यासाठी या तीन गोष्टी जर आवश्यक असतील तर माझ्या दृष्टीने आणखी काही गोष्टींची भर त्यात घातली पाहिजे. त्या म्हणजे वाचणे, लिहिणे, साहित्याचा आस्वाद घेणे, मनमुराद भटकंती करणे, संगीत ऐकणे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे समोरच्याशी संवाद साधणे . मला माहिती आहे की, या सगळ्या गोष्टी नाही केल्या तरी माणूस जगू शकेल. ‘ लेकिन ये जीना भी कोई जीना है ‘ अशी आपली अवस्था होईल. इतर प्राणी आणि माणसाच्या जगण्यात फरक राहणार नाही. ज्याला मन आहे तो माणूस. आणि आपण माणूस आहोत. एक चिनी म्हण आहे, ‘ तुम्हाला दोन पैसे सापडले तर, एक पैशाची भाकरी घ्या आणि एका पैशाचे गुलाबाचे फुल घ्या. भाकरी तुम्हाला जगवेल , आणि कसे आणि का जगायचे हे गुलाबाचं फुल शिकवेल. 

काय शिकवतं बरं गुलाबाचं  फुल आपल्याला ? गुलाब काट्यांवर फुलतो. काट्यांची पर्वा न करता. आतूनच कसा फुलून येतो. कसा खुलतो. आधी असणाऱ्या नाजूक, दिमाखदार कळीचं कसं  फुल होतं हे सगळं बघण्यासारखं असतं . या साठी नजर हवी. त्याचं फुलणं तनामनात साठवून घेता यायला हवं. त्याच्या पाकळ्या बघा, किती तलम , रेशमी, मऊ, मुलायम. त्या पाकळ्यांवरचे रंग बघा. कुठे गडद,कुठे फिके तर कुठे एकमेकात मिसळलेले. कुठून आणलं  त्यानं हे सौंदर्य ? तर हे आतून आलं. त्याच्यामध्ये जी फुलण्याची क्षमता आहे, त्या पूर्ण क्षमतेनिशी ते फुल फुलून आलंय . काट्यांची, वारा , वादळाची, पावसाची पर्वा न करता. टेनिसन नावाचा एक इंग्रजी कवी म्हणतो, ‘ एक फुल जाणणे म्हणजे सारे विश्व जाणणे .’ खरंच आहे. या फुलाच्या जन्माचे, फुलण्याचे रहस्य तुम्हाला समजले, तर जीवनाचे रहस्यही तुम्हाला उलगडेल.

ते गुलाबाचं फुल आपल्याला जणू सांगतंय  की परिस्थितीची पर्वा करू नका. आपल्या अवतीभवती काटेकुटे असू द्या. अनंत संकटे असू द्या. आपल्या पूर्ण क्षमतेनिशी फुलून या. स्वतःला व्यक्त करा. व्यक्त व्हा. अव्यक्तातून व्यक्त व्हा. लिखाण करणे किंवा लिहिणे हे व्यक्त होण्याचे एक माध्यम आहे. समोरच्या व्यक्तीशी प्रभावी संवाद साधण्याचे एक माध्यम आहे. समर्थ रामदास म्हणतात, ‘ दिसामाजी काहीतरी लिहावे. ‘ कशासाठी लिहायचं ? लोकांसाठी ? त्यांना काही सांगण्यासाठी ? हा तर माझ्या लिखाणाचा नक्कीच उद्देश नाही. मी का लिहितो या प्रश्नाचं प्राथमिक उत्तर म्हणजे ‘ स्वान्तसुखाय ‘. मला आनंद होतो म्हणून मी लिहितो. माझ्या लिखाणातून मी व्यक्त होतो. कुठल्याही अभिव्यक्तीचं अगदी ताबडतोब आणि तात्काळ मिळणारं फळ म्हणजे आनंद, ती व्यक्त करण्याचे समाधान. ते समाधान माझ्या लिखाणातून मला मिळते.

एखाद्या चित्रकाराने खूप मेहनत करून एखादे चित्र काढावे, एखाद्या वास्तुविशारदाने दिवसरात्र खपून एखादी सुंदर वास्तू उभी करावी, एखाद्या मुर्तीकाराने मोठ्या परिश्रमपूर्वक एखादी मूर्ती घडवावी आणि आपल्या निर्मितीकडे बघावे. त्यावेळी त्याला जो आनंद असतो ना, तोच नवनिर्मितीचा आनंद एखाद्या लेखकाला आपल्या साहित्यकृतीच्या निर्मितीनंतर होत असतो. एखाद्या मातेने  बाळाला जन्म दिल्यानंतर त्या बाळाकडे पाहताना जसे तिच्या सर्व श्रमाचे सार्थक होते, तसा आनंद ही नवनिर्मिती लेखकाला मिळवून देते.

ही  नवनिर्मिती जर मनापासून केली असेल, म्हणजेच आतून आली असेल, आणि वर्डस्वर्थसच्या शब्दात सांगायचे तर ‘ Spontaneous overflow of powerful feelings recollected in tranquility ‘ असेल तर समोरच्याला ती नक्की आवडतेच. म्हणजेच त्या वेळी माझे लिखाण मला तर आनंद देतेच, पण समोरच्याला सुद्धा आनंद देण्याची क्षमता त्यात असते. मोर स्वतःच्या आनंदासाठी नाचतो पण त्याचा फुललेला मोरपिसारा कोणाला आवडत नाही ! मग माझे लिखाण दुसऱ्याला जर आनंद देणारे असेल तर मी का लिहू नये ? माझे लेखन माझ्या भावना, माझे विचार दुसऱ्यापर्यंत पोहचवण्याचे एक माध्यम आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात सांगायचं तर ‘ ये हृदयीचे ते हृदयी घातले ‘ अशी ही गोष्ट असते. आणि जेव्हा मला लक्षात येते की माझे लिखाण लोकांना आवडते आहे, तेव्हा मला मग लिखाणासाठी आणखी उत्साह येतो. मग मी मला त्यांच्यासमोर व्यक्त करीत जातो.

मी पस्तीस वर्षे शिक्षक म्हणून काम केले. एखाद्या वर्गात जेव्हा मी मुलांना तल्लीन होऊन शिकवीत असे, त्या माध्यमातून पूर्ण व्यक्त होत असे त्या वेळी होणारा आनंद काही वेगळाच असायचा. मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, समाधान माझा आनंद द्विगुणित करीत असे. अशा वेळी मला वेळेचे भान राहत नसे. तास संपल्यानंतर तृप्त मनाने मी वर्गाबाहेर पडत असे. या समाधानाची सुवर्ण मौक्तिके  मी माझ्या आनंदाच्या जीवनकोशात अनेकदा जमा केली आहेत. सेवेत असताना मला लिखाणासाठी फारसा वेळ मिळत नसे. निवृत्त्तीनंतर तो मिळू लागला. मी सहज माझ्या आनंदासाठी लिहू लागलो. अशा वेळी इंटरनेट आणि फेसबुक सारखा सोशल मीडिया माझ्या हाताशी उपलबध होता. त्याचा मी वापर करू लागलो. मलाही कुठे तरी व्यक्त व्हायला माध्यम हवे होते, ते या रूपाने अनायासे मिळाले. मग जवळपास वर्षभर ‘ प्रभातपुष्प ‘ नावाचे सादर नियमित लिहीत होतो. ते वाचकांना आवडू लागले. ते त्याची मागणी करू लागले, त्यावर प्रतिक्रिया देऊ लागले. एखादे दिवशी जर काही कारणाने लेखन झाले नाही, तर विचारणा करू लागले. मग पुढे त्यांच्याच आग्रह आणि सूचनेवरून या लेखांचे ‘ कवडसे सोनेरी..अंतरीचे ‘ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. आणि मग आजपर्यंत दहा पुस्तके ! आनंद  घ्यावा आणि आनंद द्यावा, आनंद अवघा वाटावा. असे हे आनंदरूप होणे, म्हणजे लिहिणे. म्हणून मी लिहितो. माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ क्रिकेटपटू व्हावे की सैनिक? ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? विविधा ?

क्रिकेटपटू व्हावे की सैनिक? ☆ श्री संभाजी बबन गायके 

माझ्या सैनिकी कारकीर्दीत माझा सहपाठी असलेल्या एकाने मला एक आश्चर्यकारक गोष्ट सांगितली! तो त्याच्या तरुणपणी सेनादलाच्या संघाकडून रणजी   ट्रॉफी स्पर्धेत क्रिकेट खेळला होता. त्याचा लहान भाऊही क्रिकेट खेळायचा. आणि त्याला भारतीय संघाकडून एक कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली होती. आणि हे दोघेही माजी क्रिकेटपटू असल्याने त्यांना  बी .सी.सी.आय. अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून  मासिक निवृत्तीवेतन दिले जात होते! हा माझा मित्र तब्बल पंचवीस रणजी सामने खेळला होता आणि त्याला महिन्याला पंधरा हजार रुपये निवृत्तीवेतन मिळत होते आणि….केवळ एकाच कसोटीत खेळलेल्या त्याच्या धाकट्या भावाला पंचाहत्तर हजार! शिवाय बी.सी.सी.आय. च्या एका योजनेनुसार निवृत्त माजी कसोटीपटू मंडळींना त्यांच्या उर्वरीत आयुष्यात आर्थिक साहाय्य म्हणून जवळपास एक कोटी इतकी रक्कम दिली गेली होती. आणि यात वावगे असे काही नव्हते! 

पण रकमांमधील फरकामुळे मी विचारात पडलो….आपण भारतीय कसे विचार करतो? आपली मूल्ये काय आहेत? हा  तो विचार होता. मी भारतीय फौजेत एकोणतीस वर्षे सेवा केली. १९७१ च्या भारत पाक लढाईत शौर्य गाजवल्याबद्दल मला वीरचक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते! परमवीर चक्र, महावीर चक्र यानंतर वीर चक्र हा तिसरा मोठा सन्मान समजला जातो! याबद्दल सेवेत असताना सैनिकास विशेष भत्ता आणि निवृत्तिवेतनातही काही रक्कम दिली जाते…सुरुवातीला एक छोटी रक्कम असते…मग पे कमिशन नुसार ही रक्कम थोडी थोडी वाढत जाते…मला आता पस्तीसशे रुपये मिळतात…वीर चक्र मिळवल्याबद्दल! महावीर चक्र विजेत्यांना पाच हजार आणि परमवीर चक्र विजेत्यांना दहा हजार दिले जातात!  

एका सैनिकाच्या जीविताची ही एवढी किंमत पाहून मी पुन्हा विचारमग्न झालो! बहुतांश सैन्य शौर्य पुरस्कार हे मरणोत्तर दिले जातात. मृत सैनिकांचे वारस ही रक्कम मिळवण्यास पात्र ठरतात. मृत सैनिकाच्या कुटुंबास ग्रुप इन्शुरन्स फंड आणि पेन्शन अशी काही रक्कम दिली जाते…जी काही लाख रुपयांत असते. बी.सी.सी.आय. माजी क्रिकेटपटू मंडळींना देत असलेल्या रकमेच्या तुलनेत ही रक्कम अगदीच किरकोळ दिसते! मला शौर्य पुरस्कार मिळाला तेंव्हा पंजाब सरकारने मला पाच एकर जमिनीच्या बदल्यात पंचवीस हजार रुपये दिले होते. ही  रक्कम  ऑलीम्पिक्स,आशियाई स्पर्धा, कॉमनवेल्थ गेम्स यांत पदके मिळवणा-या खेळाडूस मिळणा-या पुरस्कार राशीशी तुलना करता कितीतरी पट अधिक भरेल!  याचा एक अर्थ आहे…सैनिकांचे जीवित तसे स्वस्त आहे!

क्रिकेट खेळत असलेला खेळाडू आणि युद्धात किंवा सैनिकी कर्तव्य करीत असलेला सैनिक…यांच्यात तुलना करून पाहू. क्रिकेटपटूकडे लाल,पांढरा चेंडू फार तर दीडशेच्या वेगाने येतो. सैनिकावर गोळी,बॉम्ब यांनी हल्ला होऊ शकतो आणि या विनाशकारी वस्तूंचा वेग काहीवेळा प्रकाशाच्या वेगापेक्षाही अधिक असतो! क्रिकेटपटू त्याच्याकडे आलेला चेंडू लाकडी फळीने टोलवू शकतो..अवघड असेल तर चेंडू सोडून देऊ शकतो…फार फार तर तो चेंडू त्याच्या शरीरावर आदळू शकतो….आणि त्याच्या शरीरावर ठिकठीकाणी संरक्षक कवचे लावलेली असतात…पण सैनिक फक्त एवढेच करू शकतो…त्याच्या दिशेने येणारी गोळी..तिचा नेम चुकावा!

क्रिकेटपटू आणि सैनिक…दोघेही देशासाठी काहीतरी करीत असतात. सामना हरला तर ‘ हा एक खेळ तर आहे ..हारजीत होतेच..’ असे म्हटले जाते. पण सैनिकाला पराभूत होऊन चालणार नसते! क्रिकेटपटू ‘भारतरत्न’ होऊ शकतो…पण प्रचंड  पराक्रम गाजवलेले फिल्ड मार्शल माणेकशा साहेबांपासून हा सन्मान दूरच राहतो.

पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट सामना हरणे आणि पाकिस्तान करीत असलेल्या छुप्या युद्धात नुकसान होणे यांपैकी भारतीय मानसिकता नक्की कशामुळे जास्त दुखावली जात असेल असा प्रश्न मला पडतो. त्यामुळेच असे वाटते की सैनिक व्हावे की क्रिकेटपटू?

(हे फेसबुकवरील एका लेखाचे स्वैर भाषांतर आहे. लेखकांचे नाव मला अज्ञात आहे…माहित झाल्यास सांगेन. हे सैन्यात अधिकारी होते असे लेखातील संदर्भातून समजते. त्यांनी मांडलेले मुद्दे विचार करण्यासारखे आहेत, असे वाटल्याने परवानगी न घेता मी हे भाषांतर केले आहे. क्रिकेट खेळात खेळाडू भरपूर पैसे मिळवतात यात काही नवीन आणि वावगे नाही प्रथमदर्शनी. मात्र या तुलनेत, जे आपल्या जीविताचे संरक्षण त्यांचे प्राण पणाला लावून करतात..त्यांना देश किती आर्थिक सहाय्य देतो याचाही विचार करायला पाहिजे. सैनिकी अधिकारी प्रशिक्षण काळात मृत्यू झाल्यास त्या मृत सैनिक,अधिका-याच्या कुटुंबियाना एक पैसा नुकसान भरपाई दिली जात नाही,तसा नियमच आहे. आणि या बाजूला मात्र एक षटकार,एक झेल, एक विकेट (याला बळी असे नाव आहे मराठीत.)  एक धावचीत…यासाठी किती रक्कम द्यावी याला काही धरबंद? असो. या लेखामुळे काही यात बदल होईल लगेच असे नाही…मात्र विचार करायला काय हरकत आहे…आपल्याला कुठे काही द्यायचे आणि घ्यायचे आहे? पैसा आपला थोडाच आहे?

(लेखकांचे नाव कुणाला ज्ञात असल्यास जरूर कळवावे.) (९८८१२९८२६०)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बाकी उरलेला गोयंकर बाब… – लेखिका – सुश्री शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

☆ बाकी उरलेला गोयंकर बाब… – लेखिका – सुश्री शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

(नुकतीच बा.भ. बोरकरांची पुण्यतिथी  झाली. त्यानिमित्ताने)

बा. भ. बोरकरांबद्दल काय लिहावं? त्यांची पहिली कविता माझ्या वाचनात आली ती अर्थात ‘माझ्या गोव्याच्या भूमीत’. मराठी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक शाळकरी किंवा महाविद्यालयीन गोयंकर विद्यार्थ्याने ही कविता आपल्या भाषणात कधी ना कधी म्हटलेली असतेच. मीही त्याला अपवाद नव्हते. चौथीत असताना गोवा स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या भाषणाची सुरवात मी ह्याच कवितेने केली होती. अर्थात तेव्हा ती शाळेतल्या बाईंनी माझ्याकडून घोटवून घेतली होती. काव्यगुण वगैरे कळायचे वय नव्हतेच ते, पण त्यातल्या सहज सोप्या, त्या वयात उमजेल अश्या उपमा आवडल्या होत्या.

पण पुढे दहावी-अकरावीला येईपर्यंत बोरकरांची हीच कविता इतक्या शाळकरी बाळबोध भाषणांमधून ऐकली की  मला ती कविताच बाळबोध आणि शाळकरी वाटायला लागली. दोष कवितेचा नव्हता, कविता वापरून वापरून गुळगुळीत करणाऱ्या लोकांचा होता, पण एखादं भरजरी, गर्भरेशमी वस्त्र देखील रोज वापरलं तर चार-आठ दिवसात जसं कळकट आणि बोंदरं होऊन जातं तशी ही कविता मला त्या वेळी भासायला लागलेली होती.

पुढे मराठी भाषा अभ्यासक्रमाचा भाग म्हणून ’तेथे कर माझे जुळती’ आणि ‘जीवन त्यांना कळले हो’ ह्या सारख्या बोरकरांच्या कविता वाचल्या तेव्हा हळूहळू कळायला लागले की बोरकर कवी म्हणून किती मोठे आहेत ते. ह्याच दरम्यान कधीतरी त्यांची लावण्य रेखा ही कविता वाचनात आली आणि तेव्हा मात्र मी पूर्ण भारावून गेले. अगदी आजही ही कुसुमाग्रजांचे पृथ्वीचे प्रेमगीत आणि बोरकरांची लावण्य रेखा ह्या माझ्या सर्वात आवडत्या मराठी कविता आहेत. त्यातले शेवटचे कडवे तर मला प्रचंड आवडते. 

‘देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके

चांदणे ज्यातूनफाके शुभ्र पार्‍यासारखे

देखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्तसा

अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा’

त्याच्या पहिल्या दोन ओळी वाचून मला माझ्या आजोबांची आठवण होते. हाती आले ते आयुष्य घेऊन प्रामाणिकपणे जगले ते, आणि त्यातूनही जमेल तेव्हढे त्यांनी समाजासाठी केले. मी त्यांची सर्वात धाकटी नात, मी त्यांना पाहिलेच मुळी त्यांच्या पक्व म्हातारपणी, बरे-वाईट सर्व जीवनाच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्यावर स्थिरावलेल्या शांत डोहाप्रमाणे ते झाले होते त्या वेळी.

पुढे मीही मराठीत लिहायला लागले तेव्हा बोरकर मला वेगळ्या अर्थाने उमगायला लागले. माझ्या लेखनात माझ्याही नकळत काही कोंकणी शब्द डोकावून जातात, कुंपण हा शब्द मला येत नाही असं नाही, पण त्याच्यापेक्षा वंय ह्या शब्दाला पोफळीचा शिडशिडीत, सडपातळ गोडवा आहे. टाकळा ह्या मराठी शब्दाला एक कोरडा खडखडीत भाव आहे, पण त्याचेच कोपरे घासून गोलाकार केले की कोंकणीत ते रोप तायकिळो बनून लाडिकपणे आपल्या भेटीस येतं.

बाकीबाब बोरकरांचं सांगायचं झालं तर त्यांचं अस्सल गोयंकारपण बोरकरांनी कधीच सोडलं नाही. त्यांच्या कवितेतून भेटणाऱ्या अनेक  कोंकणी शब्दांमधून पदोपदी गोवा डोकावतो. एखाद्या वर्गात शिक्षक गणिताचे अवघड प्रमेय सोडवून दाखवत असतात, सर्व मुले एकाग्र चित्ताने ते प्रमेय उतरवून घेत असताना, एखादा खोडकर मुलगा फळ्यावर लक्ष द्यायचे सोडून वर्गाच्या खिडकीतून बाहेर डोकावत असतो आणि त्याच्यामुळेच तो वर्ग जिवंत वाटतो, नैसर्गिक वाटतो, तसे ते बोरकरांच्या कवितेतले खिडकीबाहेर डोकावणारे व्रात्य कोंकणी शब्द. त्या शब्दांशिवाय बोरकरांची कविता इतकी अर्थवाही आणि नादमधुर झालीच नसती.

फूल औदुंबरालाही येते, पण ‘आलिंगन चुंबनाविना हे मीलन आपुले झाले ग, पाहा पाहा परसात हरीच्या रुमडाला सुम आले ग’ ह्या ओळींमध्ये जी अर्थगर्भ गेयता आहे, अध्यात्माची सांवळी छटा आहे ती ‘पहा पहा बागेत हरीच्या औदुंबराला फूल आले गं’ ह्या ओळीत उमटलीच नसती.

गोव्याच्या सुरंगीच्या, जाईच्या, सुक्या मासळीच्या, पहिल्या पावसानंतर घमघमणाऱ्या तांबड्या मातीच्या खरपूस वासाने दरवाळणारी बोरकरांची कविता. गोव्याच्या तत्कालीन संस्कृतीचा, बोरीसारख्या जुवारी नदीकाठच्या, नारळी पोफळींनी नटलेल्या निसर्गरम्य गावात गेलेल्या बालपणाचा ठसा बोरकरांच्या लेखनात ठाई ठाई दिसतो. देवळातली भजने आणि चर्चच्या घंटा ऐकत बोरकर लहानाचे मोठे झाले.

हिंदू एकत्र कुटुंबातील गोतावळा, भरल्या घरचे सणवार, पोर्तुगीझ शिक्षणामुळे झालेली युरोपीय कवितेची  संस्कृतीची, जीवनपद्धतीची ओळख, बालपणापासून मराठी संत साहित्य, अभंग-भूपाळ्या नित्य कानावर पडत आल्यामुळे नकळतच मनात खोल रुजलेला भारतीय तत्त्वविचार आणि मुळातला सौंदर्यासक्त, रसलोलुप आणि तरीही अध्यात्माने भारावलेला पिंड ह्या सर्वांचे एकत्रित, अजब मिश्रण बोरकरांच्या कवितेत दिसते.

मी बोरकरांपेक्षा कितीतरी लहान, त्यांच्या नातवंडांच्या पिढीची. पण ज्या आणि जश्या वातावरणात बोरकर वाढले जवळजवळ तश्याच सांस्कृतिक वातावरणात मीही वाढले. बोरकरांची जडणघडण झाली ती पारतंत्र्याच्या जोखडाखाली असलेल्या गोव्यात. माझा जन्मच झाला स्वतंत्र भारताचा अविभाज्य भाग असलेल्या गोव्यात. राजकीय परिस्थिती वेगवेगळी असली तरी सांस्कृतिक परिस्थिती मला घडवणाऱ्या गोव्यात बरीचशी तशीच होती. त्यामुळे बोरकरांच्या कवितेतून डोकावणारा गोवा मलाही माझाच वाटतो.

१९३७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या जीवनसंगीत ह्या बोरकरांच्या दुसरया काव्यसंग्रहातल्या कविता वाचताना मला हे खूप जाणवलं. ह्या संग्रहातल्या कविता ह्या बहुतांशी संस्कृतप्रचुर, तांब्यांच्या, केशवसुतांच्या कवितेची छाप असलेल्या. तरीही त्या कवितांमधून दिसणारे गोयंकार बाकीबाबांचे दर्शन फार लोभस आहे. कोंकणीत सांगायचे तर अपुरबायेचे!

इतुक्या लौकर न येई मरणा’ ही कविता म्हणजे एका सौंदर्यासक्त, जीवनावर भरभरून प्रेम करणाऱ्या रसिक गोयंकाराचे हृदगतच आहे, ‘रेंदेराचे ऐकत गान, भानहीन मज मोडुनी मान, चुडतांच्या शेजेवर पडून भोगू दे मूक निःशब्दपणा’ ही इच्छा फक्त एक सच्चा गोयंकारच व्यक्त करू शकतो. रेंदेर म्हणजे माडाच्या झाडावर चढणारा आणि माडाच्या थेंबथेंब टपकणाऱ्या नीरेसाठी वर खाच करून तिथे मातीचे मडके लावणारा टॉडी टॅपर. ही नीरा पुढे माडाची फेणी करण्यासाठी आणि पावाचे पीठ आंबवण्यासाठी वापरली जाते. पायाच्या बेचक्यात माडाचे झाड कवटाळून तुरुतुरु वर चढणारा, कमरेला कोयती आणि मातीचे मडके बांधलेला रेंदेर हा माझ्याही पिढीने बघितलेला आहे.

ह्याच कवितेत बोरकरांनी झऱ्यासाठी वझरा हा खास कोकणी शब्द वापरलेला आहे. ह्याच कवितेतल्या ’तिखट कढीने जेवूनि घ्यावे मासळीचा सेवित स्वाद दुणा’ ह्या ओळी ऐकूनच पु. ल. देशपांडे ह्यांच्या आजीने, म्हणजे बाय ने बोरकरांना ’अच्च गोयंकार व्हो’ म्हणजे ‘सच्चा गोवेकर आहे हा’ हे सर्टिफिकेट दिले होते असा उल्लेख पुलंच्या त्यांच्या आजोबांवरच्या लेखात आहे.

जीवनसंगित मधल्याच ‘दवरणे’ आणि ‘मुशाफिरा’ ह्या दोन कवितांमध्ये बोरकरांनी ज्या उपमा आणि शब्द वापरले आहेत आणि जी शब्दचित्रे रेखाटली आहेत ती एकदम खास गोव्याची आणि त्यातही, बोरी गांवची आहेत. दवरणे किंवा कटे म्हणजे भारशिळा. पूर्वीच्या काळी लोक पाठीवर ओझे घेऊन मैलोनमैल चालत. तेव्हा त्यांना पाठीवरचा भार टेकता यावा, क्षणभर विश्रांती घेता यावी म्हणून वाटेवर असे  दवरण्याचे दगड किंवा कटे बनवलेले असत. गोव्यात जांभा दगड खूप. त्याच्या शीळा एकावर एक रचून बनवलेली हे कटे, एखाद्या रणरणत्या निष्पर्ण माळावर वाटसरुंची वाट पहात वर्षानुवर्षे उभे असत. खुद्द माझ्या कुंकळ्ळी गावात असे बारा कटे आणि त्याभोवती वस्त्या होत्या.

अश्या ह्या उजाड माळावरच्या एकाकी ‘दवरण्या’चे वर्णन बोरकरांनी ’शांत विरागी’ असे केले आहे, ज्यावर त्यांनीही आपल्या हृदयावरचे ओझे खाली ठेवून आपले कवीमन उघडे केले. ‘मुशाफिरा’ ही कविता म्हणजे तर बोरकरांच्या बोरी गांवचे रेखाटलेले एक विलक्षण चित्रदर्शी शब्दचित्र आहे. ‘सांज दाटली शिरी, परतली घरा भिरी, सांवळ्या रुखावळीत धूर मात्र कापरा, स्तब्ध मार्ग तांबडा, वळत जाय वाकडा, मोडक्या पुलाकडून तार जाय बंदरा’ ह्या ओळींमधल्या प्रत्येक शब्दातून बोरकरांचे अस्सल गोयंकारपण दिसते. कातरवेळेचा स्वतःचा असा एक विलक्षण दुखरा, हळवा करणारा उदास मूड असतो तो ह्या ओळींनी अत्यंत समर्थपणे पकडला आहे.

ह्याच कवितासंग्रहातल्या ’वारुणी रात’ ह्या कवितेत बोरकरांनी शेतातली कापणी ह्या अर्थी ‘लुवणी’ हा खास गोव्याचा कोंकणी शब्द वापरलेला आहे. ‘अर्धे लुवल्या अर्धे  मळल्या अफाट त्या शेतात’ ह्या ओळीत जी नादमधुर गेयता आहे ती ’अर्धे कापल्या, अर्धे मळल्या’ ह्या ओळीत नसती उतरली. करवंटीच्या ऐवजी योजलेला करटी-वाटी हा शब्दप्रयोग तसाच गोव्याची आठवण करून देणारा आहे.

‘सागरा’ ह्या कवितेत त्यांनी समुद्राच्या लाटांचे वर्णन करताना हिरव्या-निळ्या ह्या शब्दप्रयोगाऐवजी, ‘पाचव्या-निळ्या’ ही विशेषणे वापरली आहेत. गोव्याच्या कोंकणीत हिरव्या रंगाला ’पाचवो’ म्हणतात. त्यात पाचूच्या रंगाचा हे अध्याहृत आहे. पुढे बोरकर एका ठिकाणी ’भीतीचा किंवाटा’ हा शब्दप्रयोग करतात. किंवाटा म्हणजे कोंकणीत आवेग, तो भीतीचाही असतो, प्रेमाचाही असतो. इथे लाटा ला यमक म्हणून बोरकरांनी किंवाटा हा शब्द वापरलाय.

संधीकाल ही कविता तर गोव्याच्या एका उन्हाळी संध्याकाळचे अतिशय सुंदर वर्णन करते. वसंत सरून गिम म्हणजे ग्रीष्म ऋतू सुरु झालेला आहे, परसातील आंबा ‘फळभारे रंगा’ आलेला आहे. कैऱ्या खायला तुरतुरीत खारींची येजा त्या आंब्यावर सुरु झाली आहे. ‘चपल चानिया धावत तुरतुर झटती सर्वांगा’ ह्या एका लयबद्ध ओळीत बोरकरांनी हे शब्दचित्र रेखाटले आहे. चानी म्हणजे कोंकणीत खार. खार हा शब्द न वापरता त्याऐवजी चानी हा खास कोंकणी शब्द वापरून बोरकरांनी अनुप्रास साधला आहे.

ह्याच कवितेत फुलपाखरासाठी त्यांनी ’पिसोळे’ हा खास कोंकणी शब्द वापरला आहे जो पुढेही त्यांच्या अनेक कवितांमधून दिसतो. ‘चपळ पिसोळी चतुर चोरटी भुरभुरती जवळी’ ह्या ओळीत संगीत आहे, लयबद्धता आहे जी ‘चपळ फुलपाखरे चतुर चोरटी’ ह्या शब्दप्रयोगात कधीच आली नसती.

बाळकृष्ण भगवंत बोरकर ह्या थोर कवीच्या कवितेतून सर्व काव्यगुण वजा केले तरी जो बाकी उरतो तो गोयंकार बाब मला फार फार लोभसवाणा वाटतो.

लेखिका : सुश्री शेफाली वैद्य

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग १६ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १६ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- ‘आपल्यासाठी आपल्या हिताचं काय हे आपल्यापेक्षा त्याला जास्त समजतं. तो यश देतोच. क्वचित कधी अपयश आल्यासारखं वाटलं तरी त्यातच आपलं हित आहे हे नंतर जाणवतंच’ कधीकाळी बाबांच्या तोंडून कानावर पडलेल्या या शब्दांचा रोख गेल्या दोन-तीन महिन्यात घडलेल्या माझ्या संपूर्ण आयुष्याला नेमकी आणि वेगळी कलाटणी देणाऱ्या घटनांकडेच असावा असा विश्वास वाटण्याइतका या शब्दांचा नेमका अर्थ या अनुभवांनी मला समजून सांगितला होता.’त्या’ला मी इतकी वर्ष मानत आलो होतो.या सर्व घटनाक्रमांच्या निमित्ताने ‘त्या’ला जाणण्याची प्रक्रियाही माझ्या मनात नकळत सुरू झाली!)

असोशीने धरून ठेवायला धडपडत होतो ते हातातून निसटून गेलं होतं आणि जे मिळणं शक्यच नाही असं गृहित धरलं होतं ते मात्र अगदी अनपेक्षितपणे मला मिळालं होतं! स्टेट बँक आणि युनियन बँक यांच्या बाबतीतले परस्परविरोधी  असे हे दोन प्रसंग ‘सगळं सुरळीत होईल,काळजी नको.’ हे बाबांचे शब्द सार्थ ठरवणारेच होते!

समोर गडद अंधार पसरलेला असताना निरंजन साठे माझ्या आयुष्यात आले होते. आणि मला डॉ. कर्डकांकडे  सुपूर्द करून गेले होते.होय.कारण मला नेमणूकपत्र मिळालं ते होतं डाॅ.कर्डक यांच्याच अधिपत्याखालील रेक्रूटमेंटसेलला जाॅईन होण्यासाठीचं!डाॅ.कर्डक आणि निरंजन साठे यांचं हे अल्पकाळासाठी असं माझ्या आयुष्यात येणं माझ्या मनावर  अमिट ठसा उमटवणारे ऋणानुबंध जसे तसेच माझ्यावरील ‘त्या’च्या कृपालोभाची प्रसादचिन्हेसुद्धा!

युनियन बँकेत मी १३ मार्च १९७२ रोजी जॉईन झालो आणि एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. बँकिंगक्षेत्रातल्या माझ्यासारख्या नवोदितांना सुरुवातीचा सहा महिन्यांचा प्रोबेशन पिरिएड म्हणजे खूप मोठे दडपण वाटत असे.तो प्रोबेशन पिरिएड समाधानकारक पूर्ण झाला तरच नोकरीत कायम केल़ जायचं. हे सहा महिने रजाही मिळणार नव्हती. म्हणून मग जॉईन होण्यापूर्वीच मी घरी जाऊन सर्वांना भेटून यायचं ठरवलं. त्या भेटीत समाधान मात्र मिळालं नाहीच. हळूहळू परावलंबी होत चाललेले माझे बाबा अंथरुणाला खिळून होते. त्यांच्या नेमक्या गरजेच्यावेळी मला त्यांच्याजवळ रहाता येत नाहीये या विचाराने मी अस्वस्थ होत असे.त्यांचा निरोप घेऊन निघालो तेव्हा अंथरुणावर पडल्या पडल्याच त्यांनी स्वतःचा थरथरता हात क्षणभर कसाबसा  वर उचलून मला आशीर्वाद दिला. तेच हळवे क्षण सोबत घेऊन मी बाहेर पडलो आणि आयुष्यातल्या नव्या वाटेवर पहिलं पाऊल टाकलं!

लवकरच माझ्या निर्णयक्षमतेची कसोटी पहाणारं एक प्रलोभन  माझी वाट पहात दबा धरून बसलेलं होतं याची मला तेव्हा कल्पनाच नव्हती. माझा प्रोबेशन पिरिएड संपला आणि मी नोकरीत कन्फर्म झालो,त्याच दिवशी मला एक पत्र आलं आणि ते युनियन बँकेतल्या सुरळीत सुरू झालेल्या माझ्या रुटीनला परस्पर छेद देणारं ठरलं!

पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे मध्यंतरीच्या काळात मी भावाच्या सल्ल्याप्रमाणे स्टेट बँकेच्या नवीन भरतीच्या जाहिरातीनुसार पुन्हा अर्ज केला होता आणि तिथे नव्याने पुन्हा रिटन टेस्ट न् इंटरव्ह्यूही देऊन आलो होतो. अर्थात तेव्हा माझ्या दृष्टीने तो फक्त एक उपचार होता. म्हणूनच असेल मी ते विसरूनही गेलो होतो. पण नेमकी त्याचीच आठवण करून देणारं हे पत्र होतं. स्टेट बँकेकडून नवीन अपॉइंटमेंट ऑफर करणारं ते पत्र पाहून मला क्षणभर आश्चर्यच वाटलं.दुसऱ्याच क्षणी आता यापुढे कसलीच अस्थिरता नको असंच वाटत राहिलं. हातचं सोडून पळत्याच्या मागे लागणं योग्य ठरेल? पुन्हा नवीन नोकरी, पुन्हा सहा महिन्यांचा प्रोबेशन पिरियड..सगळं सुरळीत होईल? आणि नाही झालं तर? पुन्हा ती विषाची परीक्षा नकोच‌.

मी ते पत्र ड्राॅवरमधे ठेवून दिलं आणि तो विषय माझ्यापुरता मिटवून टाकला. घरी सविस्तर तसं कळवून टाकलं. माझं पत्र मिळताच भावाचा लगेच फोन आला. त्याने मला वेड्यातच काढलं.म्हणाला,

“हे बघ,असा अविचार करू नकोस. आजच तुझ्या पत्राला मी सविस्तर इन्लॅंडलेटर लिहिलंय.आईलाही कांही लिहायचंय म्हणाली म्हणून ते घरी तिच्याकडे ठेवून आलोय. तिचं लिहून झालं कि ती ते पोस्टात टाकेल. सर्वबाजूने विचार केला तरीही स्टेट बँक जॉईन करणंच तुझ्या हिताचं आहे हे लक्षात ठेव. ते कसं हे सगळं सविस्तर पत्रात लिहिलंय. ते वाच आणि तसंच कर.”

मी मनाविरुद्ध ‘हो’ म्हटलं आणि फोन ठेवला. लगेच त्याचं पत्रही आलं. पत्रातला प्रत्येक मुद्दा योग्य आणि बिनतोड होता.

एकतर त्या काळी या परिसरात युनियन बँकेच्या फक्त दोन ब्रॅंचेस होत्या. कोल्हापूर आणि जयसिंगपूर.याउलट स्टेट बँकेचं ब्रॅंचनेटवर्क मात्र तालुका  पातळीपर्यंत विस्तारलेलं होतं. त्यामुळे युनियन बँकेत बदली मिळणं शक्य नव्हतंच पण स्टेट बँकेत मात्र अल्पकाळात सोईच्या जागी सहजपणे बदली मिळू शकणार होती.पे स्केल्स आणि इतर सवलतीही  युनियन बँकेच्या तुलनेत स्टेट बँकेच्याच आकर्षक होत्या. युनियन बँकेची प्रमोशन पॉलिसी ‘स्ट्रीक्टली ऑन सिनॅरीटी बेसिस अशीच होती, त्यामुळे प्रमोशनच्या संधी जवळजवळ नव्हत्याच.स्टेट बँकेत मात्र हीच पॉलिसी मेरीटला प्राधान्य देणारी होती.

हे सगळं वाचून पुन्हा उलटसुलट विचार मनात गर्दी करू लागले. आईने लिहिलेला मजकूर वाचून तर मी हळवाच होऊन गेलो. मी लवकरात लवकर जवळचं पोस्टींग मिळून तिकडं यावं म्हणून ती अधीर झाली होती. तिने लिहिलेला शब्द न् शब्द माझ्या मनात रुतत चालला होता.

‘हे झोपूनच असतात.बोलणं जवळजवळ हवं-नको एवढंच. त्यांना त्रास नको म्हणून या विषयी मुद्दाम काही सांगितलेलं नाहीये.तू जवळ आलास, अधून मधून कां होईना भेटत राहिलास तर त्यांनाही उभारी वाटेल.’

हे वाचून बाबांच्या आठवणीने मी व्याकुळ झालो. भावनेच्या आहारी जाऊन कां होईना पण मी मन घट्ट केलं. आता ‘स्टेट बँक’ हेच आपलं नशीब हे स्वीकारलं. युनियन बँक सोडायची हा निर्णय पक्का झाला. पण तरीही मनाला स्वस्थता कशी ती नव्हतीच.

‘बाबा हिंडतेफिरते असते तर त्यांच्याशी बोलता आलं असतं. त्यांनी योग्य तो मार्ग नक्कीच दाखवला असता.’ हा विचार मनात घोळत असतानाच मी हातातल्या इन्लॅंडलेटरची घडी घालू लागलो आणि क्षणभर थबकलोच. आत दुमडायचा जो आडवा फोल्ड असतो तो उलटा धरून त्यावर गिजबीट अक्षरात कांही मजकूर लिहिला असल्याचं माझ्या लक्षात आलं. पाहिलं आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. हे बाबांनी तर लिहिलं नसेल? छे! कसं शक्य आहे?बाबांचं अक्षर आणि असं? विश्वासच बसेना. पण ते बाबांनीच लिहिलेलं होतं! थरथरत्या हाताने लिहिल्याचं स्पष्ट जाणवत होतं. आणि म्हणूनच ते वेडंवाकडं आणि केविलवाणं दिसत होतं. मात्र प्रयत्नपूर्वक एकेक अक्षर जुळवायचा आटापिटा करून मी ते वाचल्यानंतर जे कांही हाती लागलं ते मात्र खरंच लाखमोलाचं होतं!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares