मराठी साहित्य – विविधा ☆ आधुनिक गुराखी… सौ.सुवर्णा कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे  ☆

सुश्री सुनिता गद्रे

 ☆ आधुनिक गुराखी… सौ.सुवर्णा कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆

आत्ताच्या पिढीला “गुराखी” हा शब्दही माहीत नसेल.  पण श्रीकृष्ण कथा ऐकली असेल तर श्रीकृष्ण गुरं हाकायला रानात जात असे आणि त्याच्या बासरी वादनाने गाई गुरं मंत्रमुग्ध होऊन आवाजाच्या मागे मागे जात वगैरे आपण वाचलेलं आहे.

पण आता ना इतकी गुरं ढोरं राहिली, ना कृष्ण अन् त्याची बासरी.

पण इथे ऑस्ट्रेलियात मात्र विस्तीर्ण पसरलेली कुरणं, हजारोनी गुरं ढोरं.

पण ती हाकायला माणसंच नाहीत. इतकी वर्ष मोटार सायकल वर बसून तीन चार माणसांकडून 3000 हेक्टर वर हे काम करून घ्यायचे. .पण शांतपणे चरणा-या गुरांना ऊंच सखल प्रदेशातून फिरताना बरेच वेळा मोटर सायकल वरून गुराखी पडायचे, गुरं दगावायची. सोबत एखाद दोन कुत्रीही सोबतीला द्यायला लागायची. हे सगळं ड्रोननी टाळलं गेलं. एका कळपातून हाकून मूळ जागी परत आणणे, परत दुसरा कळप असे करता करता दूर दूर जावं लागणा-या दुचाकीस्वार गुराख्यालाच घरी जेवायला येता यायचं नाही. ऊंच सखल प्रदेशातून फिरताना बरेच वेळा मोटर सायकल वरून गुराखी पडायचे, गुरं दगावायची. हे सगळं ड्रोननी टाळलं गेलं.

मग आणले हेलीकाॅप्टर… पण ते प्रकरण तसं खर्चिक.  श्रीमंत मालकांनाच ते परवडायचं.

आपल्या भारतात आत्ता आत्ता कुठं तुरळक ड्रोनचा वापर शेतीत औषधं फवारणीसाठी होऊ लागला आहे.  बाकी सगळे ड्रोन हे एकतर भारतीय सैन्याचे नाहीतर लग्नाच्या रिसेप्शनच्या शूटींगचे.

पण इथे जगात प्रथमच एकाने ड्रोननी गुरं हाकायची ठरवली, त्यासाठी साॅफ्टवेअर तयार करवून घेतली आधी ती उडवून प्राणी दिलेल्या कमांड ऐकतात का ते तपासलं आणि हळूहळू त्याचा वापर वाढवत वाढवत हजारोंचा कळपच्या कळप हॅक् हॅक् न करता, पाठीवर दंडुका न मारता , हवा तसा, हव्या त्या दिशेला, थांबा म्हणलं  की थांबणारा, घराकडं चला म्हणल्यावर मुकाट माघारी फिरणारा असा Drone चा भन्नाट वापर सुरू केला आहे.  शेतक-यांना त्याचा उपयोग कसा करायचा याचं प्रशिक्षण देत आहे.  हातासरशी गेलाच आहे ड्रोन 35 मीटर ऊंच तर कुठे पीक किती वाढलं आहे, पाणी आहे शेतात की घालायला हवंय हे सगळं एका जागेवरून ठिम्म न हालता ड्रोनवरील हातसफाईने करत आहे.  गुरांची संख्या पण मोजता येते, आसपास एखादा कोल्हा आला तर त्याला हा  ड्रोन हुसकावतो सुध्दा.  हेलीकाॅप्टरच्या आवाजापेक्षा गाईंना ड्रोनचा आवाज सुसह्यही वाटतोय. त्यांना ड्रोनचा आवाज ऐकला की वाटतं कुठला तरी किडा गुणगुणतोय.

आता पुढचा प्रयोग हे सगळे आख्या जगातून  जिथे कुठे इंटरनेट, GPS आहे अशा कुठूनही करता यायला पाहिजे याची चाचपणी सुरू आहे.

या प्रयोगशील शेतक-याची एकच व्यथा आहे ती म्हणजे त्यांचे संरक्षण खाते, सरकार पटापटा परमिशन देत नाही.  खरेतर सरकारही अजून ह्या बद्दल तितके जागरूक नाही शिवाय अशा वापरास ऊठसूट परवानगी दिली तर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ड्रोनचा गैरवापर तर होणार नाही ना हे अजमावून पाहात आहे. 

पण एकंदरीत उपयोगिता बघता, हळूहळू का होईना पिझ्झा डिलीव्हरी साठी ड्रोनच्या वापरापेक्षा ह्या अशा उपयुक्त कांमासाठी, जिथे आधीच मनुष्यबळ खूप कमी आहे आणि चराऊ कुरणं नजर ठरत नाही इतकी दूर आहेत, तिथे परवानगी द्यायच्या विचारात सरकार आहे. हेक्टरी फक्त एक डाॅलर खर्च येत असेल तर शेतकरी आग्रह धरणारच ह्या सुविधेचा.  पैसा, वेळ, श्रम वाचणा-या या सुविधेचा लाभ हळूहळू वाढणार आणि  ” Technology –  शाप की वरदान ” अशा निबंध लिहीणा-यांना

 ” वरदान ” मुद्दा पटवायला हा एक किस्सा लिहीता येणार .

गाईंच्या गळ्यातील घंटांचा मंजूsssळ नाद,

सांज ये गोकुळी,

धूळ उडवीत गाई निघाल्या

 

असं काही नसलेल्या देशात

ड्रोन हाच गुराखी!

— समाप्त —

लेखिका – सुवर्णा कुलकर्णी

संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वटपौर्णिमा अर्थात ‘वैश्विक पर्यावरण दिन’ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ वटपौर्णिमा अर्थात ‘वैश्विक पर्यावरण दिन’ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

।श्रीराम। आपण हिंदू लोकं उत्सवप्रिय आहोत. आपल्या संस्कृतीतील सर्व सण विज्ञानाधिष्ठीत आहेत. सर्व सण कौटुंबिक वातावरण उबदार करणारे आणि सामाजिक बांधिलकी वृद्धिंगत करणारे आहेत. हिंदूंचा कोणताही सण घेतला तरी त्यातून कोणत्या ना कोणत्या प्रकारे सामाजिक आशयच प्रगट होत असतो हे आपल्या लगेच लक्षात येईल. आपले सर्व सण सामाजिक बांधिलकी, राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभाव शिकवतात. ‘ज्याला कृष्णाचा ‘काला’ समजला त्याला वेगळी ‘राष्ट्रीय एकात्मता’ शिकविण्याची बिलकुल गरज नाही’ असे एक वचन प्रसिद्ध आहे.

चुकून कुणाला पाय लागला तर नुसते ‘क्षमस्व’ किंवा आजच्या नवीन पिढीच्या आंग्लमिश्रित भाषेत तोंडदेखलं ‘सॉरी’ म्हणणारी आपली संस्कृती नाही तर अतीव नम्रतेने ‘नमस्कार’ करणारी आपली संस्कृती आहे. अशा प्रकारचा व्यवहार अथवा परंपरा आपल्याला इतरत धर्मात अथवा उपासना पद्धतीत बघायला मिळत नाही. इतक्या सूक्ष्म स्तरावर समोरील मनुष्याच्या भावभावनांचा विचार करणारी दुसरी संस्कृती ह्या भूतलावर नक्कीच नसेल. असे असूनही परकियांपेक्षा आपले लोकच आपल्या धर्मावर जास्त टीका करतात, याचे नवल वाटते. टीका करणे आपण एक वेळ समजू शकतो, पण आज कोणताही हिंदू सण आला की त्याला विरोध करणारे एकवटतात आणि हिंदू धर्म कसा विज्ञानविरोधी आहे, अंधश्रद्धाळू आहे, बुरसटलेल्या विचारांचा आहे असे सांगण्याची तथाकथित बुद्धिजीवी लोकांची अहमहिका सुरु होते.जेष्ठ पौर्णिमेला जिवंत वडाची पूजा करणे ही अंधश्रद्धा मानणारी तथाकथित पुढारलेली ( ‘अतिप्रागतिक वैज्ञानिक दृष्टिकोन असणारी’ ) मंडळी २५ डिसेंबरला मात्र कृत्रिम ‘ख्रिसमस ट्री’ बनविताना आणि आकाशातून ‘सांताक्लाज’ नावाचा कोणी ‘देवदूत’ येईल या आशेने त्याच्या येण्याची वाट पाहतांना मात्र आपल्या दृष्टीस पडतात. अशा वेळी त्यांच्या (अ)वैज्ञानिक दृष्टिकोनाची कीव येते.

ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वडाची पूजा करण्याची पद्धत फार पूर्वीपासून आपल्याकडे आहे. याला वटपौर्णिमा असेही म्हणतात. सुवासिनींनी वडाची पूजा करावी, दिवसभर उपवास करावा आणि एकूणच त्या दिवशी ‘व्रत’ धरावे अशी अपेक्षा असते. चातुर्मासाच्या पुस्तकात सत्यवान आणि सावित्रीची कथा देखील आहे. कहाणीत सांगितल्याप्रमाणे सत्यवानाचा मृत्यू होतो. सावित्रीला हे समजल्यावर ती यमाकडे जाते आणि आपल्या पतीला जीवनदान मिळवून परत स्वगृही घेऊन येते अशा अर्थाची ही कथा आहे. ज्या झाडाखाली सत्यवान जिवंत होतो ते झाड वडाचे होते, म्हणून वडाच्या झाडाची पूजा केली जाते. भाविकांनी ती कहाणी अवश्य वाचावी.

“सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी|

तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात्|

अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते |

अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ||”

वरील प्रार्थना वटपोर्णिमे संदर्भात आहे. सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त ( साधारण हजार वर्षे) असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया `मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे’, अशी प्रार्थना करतात.

आजच्या काळात आपल्याला या व्रताचा आणि त्या कहाणीचा वेगळ्या प्रकारे विचार करता येईल. त्याआधी वड या झाडाचे गुणधर्म लक्षात घ्यायला हवेत. वडाचे बीज अतिसूक्ष्म असते, पण त्यातून निर्माण होणारा वृक्ष हा अतिविशाल असतो. वड ही अधिकाधिक प्राणवायु देणार वृक्ष आहे, त्याचे आयुष्य साधारणपणे हजार ते अकराशे वर्ष असते. वैशाख वणव्यातून बाहेर पडून धरती पावसासाठी आसुसलेली असते. दोन ऋतूंमधील संधिकाल असल्यामुळे  वातावरण प्रकृतिला त्रासदायक असते. काही ठिकाणी कमीअधिक प्रमाणात पाऊस सुद्धा झालेला असतो. त्यामुळे रोगराई वाढण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी मनुष्याला अधिक प्राणवायुची (शुद्ध वातावरणाची) गरज असते आणि ती पुरवण्याची क्षमता फक्त वडात आहे. मनुष्याने या निमित्ताने निसर्गाच्या सानिध्यात जावे, प्राणवायू अव्याहतपणे पुरविणाऱ्या वनस्पतींच्या सान्निध्यात यावे हा ह्या व्रताचा मूळ उद्देश!. वडाला पारंब्या असतात त्यामुळे त्याचा विस्तार प्रचंड होतो. विस्तार जरी प्रचंड झाला तरी तो कधी पडत नाही कारण तो वृक्ष आपल्या पारंब्यांच्या आधारावर जमिनीवर दिमाखात उभा राहतो. वड, पिंपळ या सारख्या मोठ्या वृक्षांची लागवड मुद्दाम गावाबाहेर केली जाते. वडाच्या मुळाबाजूच्या मातीत देखील प्राणवायू आणि नायट्रोजनचे प्रमाण जास्त असते हे आधुनिक विज्ञानाने सिद्ध करून दाखविले आहे. नायट्रोजनयुक्त माती खत म्हणून उपयुक्त असते. वडाच्या प्रारंब्यांपासून बनविलेले तेल केसांसाठी उपयुक्त आहे. ‘पुसंवन’ विधीमध्ये देखील वडाच्या कोवळ्या अंकुराचा उपयोग केला जातो. वडाच्या पारंब्यांचा कितीही विस्तार झाला तरी मूळ खोड कायम सतेज आणि मुख्य आधारस्तंभाच्या स्वरुपात तसेच राहते. वडाची मूळं जमिनीत खूप खोलवर रुजलेली असतात. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी कायम राखली जाते. वडाचे आणिक बरेच उपयुक्त गुणधर्म आहेत जे खास स्त्रियांसाठी गुणकारक आहेत, जिज्ञासू वाचकांनी ते अभ्यासू मंडळींकडून जाणून घ्यावेत.

श्रीगोंदवलेकर महाराजांचे एक वचन आहे. ‘आजपर्यंत हिंदू धर्म टिकला तो घरातील स्त्रियांमुळेच’. पण आज मात्र हिंदूधर्माच्या सण आणि परंपरांवर घाला घातला जात आहे आणि आपल्या सुशिक्षित माता भगिनी त्यास बळी पडत आहेत. आपल्याला पुन्हा हिंदू धर्माला पूर्वीचे वैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर आपल्या सर्व सणांचा आजच्या काळानुरूप अर्थ लावावा लागेल आणि  त्याचा प्रचार आणि प्रसार करुन येणाऱ्या नवीन पिढीपर्यंत ते योग्य मार्गाने पोहचवावे लागेल. नवीन पिढी कुशाग्र आहे त्यांना अनेक प्रश्न पडतात, त्यांची सयुक्तिक उत्तरे आपल्याला देता आली पाहिजेत अन्यथा येणारी पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही.

खरंतर ‘वटपौर्णिमा’ हाच *वैश्विक पर्यावरण दिन आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये.* सध्या आपण ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन साजरा करतो. वटपूजनाचा मूळ उद्देश हा आहे की सर्वांना वृक्षांचे महत्व कळावे, वन (वृक्ष) साक्षरता वाढावी. आपल्या कुटुंबातील वडीलधाऱ्या माणसांची काळजी आपण ज्या आत्मीयतेने काळजी घेतो तितक्याच किंवा किंबहुना त्यापेक्षा अधिक आत्मीयतेने आपण वृक्षांचे, वनांचे, वन्यजीवांचे पर्यायाने एकूणच वनसंपत्तीचे संरक्षण आणि संवर्धन केले पाहिजे असे हा सण आपल्याला सांगतो. आजची एकूणच पर्यावरणाची स्थिती बघितली, तर वृक्षसंवर्धन अमूल्य आहे याची आपणा सर्वांना निश्चितच जाणीव आहे. ही जाणीव मात्र आपल्याला जागतिक तापमान वाढायला लागल्यानंतर झालेली आहे. हे सर्व *’तहान लागल्यावर विहिरी खणण्यासारखे’ आपण करीत आहोत. आपल्या पूर्वसूरींना मात्र खूप आधीपासून याची जाणीव होती. आजच्या सारखे प्रगत तंत्रज्ञान नसतानाही ही ‘जाणीव’ त्यांनी प्रयत्नपूर्वक समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविली आणि श्रद्धेने तिचे पालन केले जाईल असे बघितले, नव्हे ती जाणीव समाजमनात उजवली,रुजवली. आज एखादी नवीन प्रणाली आत्मसात करुन ती आपल्या घरात रुजविणे किती जिकरीचे आहे, याची आपल्याला नक्कीच कल्पना आहे. म्हणून भारतासारख्या खंडप्राय देशात जिथे दर १५ किमी. वर बोली भाषा बदलते, अशा ठिकाणी वृक्षसंवर्धन करण्यासाठी एखाद्या ‘कहाणी’चा पूर्वसूरींनी आधार घेतला असेल तर ते सयुक्तिकच मानले पाहिजे. त्यांनी ही संकल्पना तत्कालीन समाजात रुजवली, संवर्धित  केली आणि आज सुद्धा हे व्रत केले जात आहे याबद्दल आपण आपल्या पूर्वजांचे ऋणी असले पाहिजे.

ज्याप्रमाणे घरातील जेष्ठांना सर्वात आधी नमस्कार केला जातो त्याचप्रमाणे जंगलातील जेष्ठ अशा वडाचे प्रातिनिधिक स्वरूपात पूजन होणे अपेक्षितच आहे. म्हणून ‘वडाचेच पूजन का?’ हा प्रश्नच गैर आहे असे वाटते. पूर्वी व्रतवैकल्ये प्रामुख्याने महिला करीत असत त्यामुळे हे व्रत महिलांकडे आले असावे. उपवास हा यातील गौण मुद्दा आहे. स्त्रीला धरित्रीची उपमा दिली जाते. स्त्री हीच जन्मदात्री आहे. निसर्गाने स्त्रीला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे ती म्हणजे मातृत्व अर्थात नवनिर्मिती करण्याची क्षमता, प्रजनन क्षमता!!!

स्त्री नैसर्गिक गुणानेच सहनशील आणि संयमित आहे. आपल्याकडे कोणतेही देवकार्य, देव पूजन स्त्रीला सोबत घेतल्याशिवाय केले जात नाही. दुर्दैवाने पत्नी हयात नसेल तर सुपारी सोबत घेऊन विधी केले जातात. तसेच आपल्या संस्कृतीत ‘स्त्री’ला लक्ष्मी मानली जाते. स्त्री जशी ‘कोमल’ ह्रदयी आहे तशी ती वेळप्रसंगी ‘दुर्गा’ही होऊ शकते. जन्म देणे आणि संगोपन करणे ही कला स्त्रीला (मादी) निसर्गानेच बहाल केली आहे. चार मुलं एकत्र येऊन आईला सांभाळू शकत नाहीत पण एक आई मात्र चार मुलांना आज सुद्धा सांभाळते. स्त्रीमध्ये मातृत्वाची भावना उपजतच असते. त्यामुळे स्त्रियांनी हे व्रत केले तर सर्व कुटुंब ते सहज स्वीकारेल आणि त्याचे काटेकोरपणे पालन होईल असाही सुप्त उद्देश त्यामागे असावा असे वाटते. कोणत्याही गोष्टीचे ‘मर्म’ न घेता नुसतेच कर्म केले गेले तर योग्य तो लाभ होऊ शकत नाही.

हिंदुधर्म पुनर्जन्म मानणारा आहे. वडाची वाढणारी प्रत्येक पारंबी ही मनुष्याचा नवीन जन्म सूचित करणारी आहे असे मानले तर सात जन्माचे रहस्य आणि वटपूजा आणिक स्पष्ट होईल. गीतेत भगवंतांनी सांगितले आहे की आत्मा मरत नाही तर तो वस्त्र बदलावे, त्याप्रमाणे फक्त शरीर (योनी) बदलत असतो. नरदेह प्राप्त झाल्याशिवाय आत्म्यास मुक्ती लाभत नाही. पारंब्या कितीही वाढल्या तरी वड आपले मूळ खोड विसरत नाही. अगदी त्याचप्रमाणे मनुष्याने कितीही वेळा जन्म घेतला आणि तरीही तो आपल्या मूळ स्वरूप असलेल्या ‘आत्मारामा’स विसरला नाही तर त्याला ‘स्व’रूपाची नक्कीच ओळख होईल. आत्मारामाची ओळख करून घेण्यातच  मानवी जीवनाचे सार्थक आहे. मनुष्य योनीत जन्मास येऊनच रामाने देवत्व प्राप्त केले. त्यामुळे आजच्या शुभदिनी प्रत्येक जोडप्याने असा दृढनिश्चय करावा की आम्हाला कितीही जन्म घ्यावे लागले तरी आमचे ध्येय एकच असेल ते म्हणजे ‘आत्मारामाची भेट’ !!!

ज्या काळातील ही कथा आहे. त्या काळातील  मनुष्याचे आयुर्मान विचारात घेतले तर ते सरासरी १४० वर्षाचे होईल आणि वडाच्या झाडाचे एकूण आयुर्मान आपण १००० वर्षे पकडले तर  सात जन्म पुरेल इतके होईल. वटवृक्षाप्रमाणे आपला वंश किमान ७ जन्म अर्थात हजार वर्षे  तरी टिकावा किंवा त्याचा वडाच्या पारंब्यांप्रमाणे वंशविस्तार व्हावा म्हणून हे व्रत !! कोणत्याही सजीवास आपला वंश वाढावा असे वाटणे नैसर्गिकच आहे, नाही का ?

पूर्वी लग्न ही ‘संस्कार’ म्हणून केली जात असतं. वंशविस्तार आणि समाजधारणा हा लग्नसंस्काराचा प्रधान हेतू होता. तसेच तत्कालीन व्यवस्थेत मुलीला आपला पती निवडण्याचे स्वातंत्र्य होते. त्या काळी पतीलाच देव अथवा गुरू मानले जाई. मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे जाण्याचा मूलभूत अधिकार पुरुषांप्रमाणे स्त्रियांना देखील होता. पतिसेवा हाच स्त्रीयांचा धर्म मानला जाई. भगवान दत्तात्रेयांच्या आईची अर्थात माता अनुसयेची कथा आपणा सर्वांना ज्ञात आहे. देवत्व प्राप्त करणे हे गुरुशिवाय शक्य नाही. म्हणून असा गुरू (आवडीचा पती) मला पुढील सात जन्म तरी मिळावा अशी प्रामाणिक इच्छा असणे गैरलागू कसे होऊ शकते? आपण कोठे प्रवासास निघालो तर सोबतीला आपण आपल्या विश्वासाचा मनुष्य बरोबर घेतो. कारण आपला प्रवास सुखाचा व्हावा अशी आपली त्यामागील भावना असते. इथे आपल्याला ‘मनुष्यत्व ते देवत्व’ असा प्रवास करायचा आहे अर्थात ‘आनंताचा’ प्रवास करायचा असेल तर आपण निवडलेला आपल्या आवडीचा सोबती प्रवास संपेपर्यंत अर्थात जिवाशिवाचे मिलन होईपर्यंत सोबत रहावा असे वाटणे अगदी स्वाभाविक आहे. वडाभोवती सूत गुंडाळण्यामागे पुर्वजांची संकल्पना अशी होती की वटवृक्षाला शिवाचे प्रतिक मानले जाते, वडाचे खोड सछिद्र असते त्यामुळे त्यास सूताने गुंडाळत फेरी मारणे हे जिवाशिवाचे मिलन झाल्याचे प्रतीक मानले जाई. भगवान शंकराचे मानसिक सामर्थ्य आणि शारीरिक क्षमता आपणांस प्राप्त व्हाव्यात ही भावना सुद्धा त्यामागे आहे. म्हणूनच पुर्वी पतीपत्नी दोघेही वडाला सूत गुंडाळत आणि प्रदक्षिणा घालत असत. प्रदक्षिणा घालणे हे मोटर फिरवण्यासारखे आहे. त्यामुळे केंद्रस्थानी असलेल्या वडाची सर्व ऊर्जा प्रदक्षिणा घालणाऱ्यास अनायासे मिळत असते.

आज विवाहामागील  ‘संस्कार’ लुप्त होत चालला असून ती आज एक प्रकारची व्यवस्था किंवा सर्वमान्य तडजोड ठरते आहे की काय याची भीती वाटू लागली आहे. सध्याचे कुटुंबातील वातावरण, एकूण सहजीवन आणि वाढत्या घटस्फोटांचे प्रमाण बघितले तर ही भीती खरी आहे असे वाटू लागते. आज विभक्त कुटुंब पद्धती रुजू पहात आहे. बदलत्या काळानुसार काही प्रमाणात ते अपरिहार्यही झाले आहे. म्हणून आज वटपौर्णिमा साजरी करीत असताना फक्त महिलांनीच याचा विचार न करता संपूर्ण कुटुंबानी आणि एकूण समाजाने याचा विचार करावा असे वाटते. व्यावहारिक अडचण असल्यामुळे दूर गेलेली कुटुंब या निमित्ताने एकत्र यावीत आणि वडाच्या पारंब्याप्रमाणे एकमेकांना आधार देत परस्परांतील स्नेह वृद्धिंगत करून आपले कुटुंब भक्कम आणि उबदार करण्याचा प्रयत्न केला जावा असे या सुचवावेसे वाटते. वटपौर्णिमेच्या निमित्ताने विश्वमान्य असलेली आपली ‘कुटुंब व्यवस्था’ अधिक सक्षम आणि सुसंस्कारित करण्याचा संकल्प आजच्या मंगलदिनी आपण सर्वांनी करावा अशी मनीषा व्यक्त करतो. आपल्या ‘कुटुंबरुपी’ वडाचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच आपल्या कुटुंबाचा समाजातील प्रत्येक घटकाला आधार वाटावा असा प्रयत्न आपण सर्वांनी करावा, यातूनच हिंदू धर्माचा वटवृक्ष बहरेल यात तीळमात्र शंका नाही.

आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। श्रीराम। 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग १३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- हा आशानिराशेचा खेळ पुढे अनेक महिने असाच सुरू राहिला. खूप प्रयत्न करूनही हाती काही न लागताच अखेर  हातातून सगळं निसटून गेलंच.स्टेट बॅंकेची पूर्वीची वेटिंग लिस्ट रद्द होऊन नवीन भरतीसाठी पेपरमधे पानभर जाहिरातही झळकली. केवळ भावाच्या आग्रहाखातर त्या जाहिरातीस प्रतिसाद म्हणून मी पुन्हा नव्याने अर्ज केला. त्याच दरम्यान माझ्या मेहुण्यांच्या ओळखीने शिवडीतल्या ‘स्वान मिल’च्या  पीडीएफ् डिपार्टमेंटला मला दिवसभर चरकातून पिळून काढणारी तुटपूंज्या पगाराची नोकरी मिळाली आणि नव्या खेळाला नव्याने सुरुवात झाली!

पुढे जे घडत गेलं ते सगळं योगायोग वाटावेत असंच, पण ते योगायोग मात्र अघटीत म्हणावेत असेच होते!

‘क्वचित कधी अपयश आलंच तरी ते आपल्या हितासाठीच होतं हे कालांतरानं जाणवतंच’ हे कधीकाळी ऐकलेले बाबांचे शब्द मी त्या संघर्षकाळात घट्ट धरून ठेवले होते आणि पुढे ते आश्चर्यकारकरीत्या शब्दशः खरेही ठरले.)

मिलमधल्या कामाचा ताण दिवसेंदिवस वाढतच होता.त्याच धकाधकीत स्टेट बॅंकेचा नव्याने केलेल्या अर्जामुळे पुन्हा रिटनटेस्टसाठी काॅल आला.ती टेस्ट होऊनही महिनाभर उलटून गेला.रोजचं रुटीन अक्षरश: कसंबसं रेटणं सुरु होतं. मिलमधली नोकरी एक तर खाजगी. मिलमजुरांची आणि इतर स्टाफची पीएफ् खाती वर्षानुवर्षे अपडेटच केलेली नव्हती. त्यामुळे ऑडिटर्सनी घेतलेल्या स्ट्रीक्ट ॲक्शनमुळे ते प्रदीर्घकाळ पेंडिंग असलेले काम शिकून घेऊन ठराविक मुदतीत पूर्ण करण्याचं प्रचंड दडपण माझ्यावर असायचं.आमचे मॅनेजर शास्त्रीसाहेब तर कायम कातावलेलेच असायचे. कामासंदर्भातल्या काही शंका असतील तर त्यांच्याकडे जाऊन सांगण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. मी अदबीने त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिलो की मला पाहून त्यांचं कपाळ आठ्यांनी भरून जायचं. ते कामच अतिशय एकसूरी आणि किचकट असल्यामुळे खूप कंटाळवाणं वाटायचं न् तिथं माझ्या शंकांचं निरसन करुन कामाला गती देणारं कुणीही नव्हतं. तरीही ती नोकरी माझी गरज म्हणून मला टिकवणं भागच होतं. कामासाठी रोज रात्री उशीरपर्यंत बसायला लागायचं. खूप उशीर झाला की बस नसल्याने भुकेल्यापोटी शिवडीहून दादरपर्यंत चालत यावे लागे.या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत बहिणीच्या घरी मिळणारं घरपण हाच एकमेव दिलासा होता.

बहिणीचं मूळ सासरघर कोल्हापूरला होतं. तिथं घरी सर्वांना आणि इस्लामपूरला आमच्या आईबाबांनाही भेटण्यासाठी म्हणून बहिणीने रजा घेऊन थोडे दिवस तिकडं जाऊन यायचं ठरवलं.तिला पोचवायला मेहुणेही जाणार होते.दोन चार दिवस राहून ते परत येणार होते. त्या दरम्यान दादरला एकट्यानंच रहाणं माझ्या जीवावर आलं होतं. ते न सांगताच समजल्यासारखं माझी डोंबिवलीची मावशी एकदा दादरला बहिणीकडे आली होती, तेव्हा ती ‘तुम्ही जाऊन परत येईपर्यंत याचे इथे जेवणाचे हाल कशाला?थोडे दिवस बदल म्हणून मी याला डोंबिवलीला घेऊन जाते’ म्हणाली.मी चार दिवस मावशीकडे रहायचं आणि मेहुणे परत येतील तेव्हा मी त्यांना दादर स्टॅंडवर उतरवून घ्यायला यायचं न् मग दोघांनी दादरच्या त्यांच्या घरी जायचं असं सगळं आमचं  निघतानाच ठरलं. हे सगळं मला त्यावेळी सोईचं वाटलं खरं, पण तेच पुढं माझ्या आयुष्यात मात्र प्रचंड उलथापालथ करणार होतं याची तेव्हा आम्हा कुणालाच कल्पना नव्हती ! आज इतक्या वर्षानंतर ते सगळं आठवतं तेव्हा या सगळ्या घटनाक्रमात लपलेल्या अघटीत योगायोगाचं आश्चर्य वाटतं एवढं खरं!

ठरल्याप्रमाणे मी त्या रविवारी डोंबिवलीहून माझी बॅग घेऊन मेहुण्याना उतरवून घ्यायला निघालो. त्यांची बस रात्री साडेआठला येणार होती. उशीर व्हायला नको म्हणून मी आठ वाजताच तिथे जाऊन बसची वाट पहात थांबलो.बस अनपेक्षितपणे तासभर उशिरा आली. तिथून चित्रा टॉकीजसमोरच्या इस्माईल बिल्डिंगमधल्या घरी पोहोचेपर्यंत रात्रीचे साडेनऊ वाजून गेले होते. सामान घरी ठेवून,फ्रेश होऊन लगेच बाहेर जेवायला जायचं ठरलं होतं. आम्ही गडबडीने कुलूप काढून दार ढकललं तर समोरच शटरमधून आत टाकलेली दोन तीन पत्रे पडलेली होती. पुढे होऊन मी ती उचलली आणि पाहिलं तर त्यात एक लिफाफा चक्क माझ्या नावाचा होता ! इथे या पत्त्यावर आणि माझं पत्र? उत्सुकतेपोटी तो लिफाफा उचलला आणि घाईघाईने उघडून पाहिला तर आत ‘युनियन बॅंक आॅफ इंडिया’ कडून आलेलं एक पत्र होतं. मुंबईत आल्याबरोबर मी मेहुण्यांच्या सल्ल्याने माझ्या मनात नसतानाही इथल्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मधे नाव नोंदवलं होतं त्याची आठवण करुन देणारं ते पत्र होतं! कारण ते पत्र म्हणजे एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजद्वारे मागवलेल्या यादीनुसार नुकत्याच राष्ट्रीयीकरण झालेल्या युनियन बँक ऑफ इंडियाने मला पाठवलेलं ते रिटन टेस्टचं कॉल लेटर होतं! जीवघेण्या उकाड्यांत अनपेक्षितपणे मनाला स्पर्शून गेलेली ती गार वाऱ्याची झुळूकच होती जशीकांही! हे अनपेक्षित पत्र म्हणजे ‘स्वान मिल’ मधल्या रुक्ष,कोंदट वातावरणातून मला तात्काळ बाहेर पडणं सहजसुलभ  करणारी एक संधीच होती.त्या अनपेक्षित आनंदाच्या भरात क्षणाचाही विलंब न लावता मी ते कॉललेटर झरझर वाचून पूर्ण केलं आणि त्याचक्षणी सगळी शक्तीच कुणीतरी काढून घेतल्यासारखा मटकन् खुर्चीत बसलो. पत्र धरलेला माझा हात थरथरु लागला. डोळे नकळत भरून आले.

फ्रेश होऊन जेवायला जायच्या तयारीने मेहुणे बाहेर आले आणि मला पहाताच थबकले.

“काय रे? काय झालं? कुणाचं..कसलं पत्र आहे ते?”

मी सून्न होऊन गप्प बसलो.आता बोलण्यासारखं कांही शिल्लक होतंच कुठं? मी न बोलता ते पत्र त्यांच्या हातात दिलं.

“ओह्…” तो धक्का त्यांनाही अनपेक्षित होता. कारण प्रवासाला जाण्यापूर्वी दादरच्या घराला कुलूप लावलं होतं त्याच दिवशी हे पत्र इथं येऊन पडलं होतं,म्हणजे साधारण आठवडा होऊन गेला होता.पण ते आमच्या हातात पडायला मात्र बराच उशीर झाला होता. कारण रिटन-टेस्टची तारीख आदल्या दिवशीची म्हणजे शनिवारची आणि वेळ दुपारी अकराची होती. अर्थातच रिटर्न टेस्ट कालच होऊन गेलेली होती!

हातातोंडाशी आलेला सुग्रास घास पुन्हा एकदा हिरावला गेला होता!

मन कोंदट अंधाराने भरुन गेलेलं असतानाच पुढचे तीन साडेतीन तास असे झंझावातासारखे आले की अनपेक्षितपणे आकारलेल्या सकारात्मक घटनांनी त्या अंधारल्या मनात पुन्हा आशेची ज्योत पल्लवित झाली!

क्रमश:..  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ राम आणि सीता ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ राम आणि सीता ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

रामायणातील अनेक महत्त्वाच्या पात्रांबद्दल आपण आजवर चर्चा केली. राम आणि सीता यांच्या जीवन  चरित्रावर पण आपण बोललो. पण या दोघांचे पती पत्नी म्हणून सहजीवन कसे होते ते आज पाहू या.

राम आणि सीता हे एकमेकांवर निस्सीम प्रेम असणारे एक असे अलौकिक जोडपे आहे की ज्यांची कीर्ती युगानुयुगे अमर राहील. राम आणि सीता यांना नियतीने एकत्र आणले होते. त्यांनी कधी एकमेकांना पाहिले नव्हते किंवा एकमेकांबद्दल ऐकले देखील नव्हते. विश्वामित्र ऋषी यज्ञाच्या रक्षणासाठी राम लक्ष्मणाला घेऊन जातात. रामलक्ष्मण  राक्षसांचा नायनाट करतात. अशा वेळी जनक राजाकडून सीतेच्या स्वयंवरासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण जनकाकडून विश्वामित्रांना येते आणि ते आपल्यासोबत राम लक्ष्मणाला घेऊन जातात.

जनकाने त्या विवाहासाठी एक पण ठेवलेला असतो, तो म्हणजे शिवधनुष्य उचलण्याचा. जेव्हा तेथे उपस्थित सगळे राजे ते उचलण्यात अयशस्वी होतात, तेव्हा विश्वामित्राच्या आदेशानुसार राम ते शिवधनुष्य उचलतो. ते त्याच्या हातून भंग होते. आणि मग सीता रामाला वरमाला घालते. मात्र विवाहापूर्वी सीता रामलक्ष्मणाला पुष्पवाटिकेत पाहते ,त्याचवेळा हा लावण्यमूर्ती असलेला राम तिच्या मनात भरतो. आणि त्याच्याशीच आपला विवाह व्हावा ही इच्छा तिच्या मनात निर्माण होते. सीता ही भूमीकन्या तर राम हा विष्णूचा अंश. त्यांच्या विवाहाने जणू भूमी आणि आकाश एकत्र येतात.

आकाशाशी जडले नाते धरणीमातेचे,

स्वयंवर झाले सीतेचे.

लग्नानंतर जेव्हा श्रीराम पित्याला दिलेल्या वचनानुसार वनवासाला निघतात, तेव्हा ते सीतेचा निरोप घ्यायला येतात. रामाशिवाय राहायचे ही कल्पना देखील सीता सहन करू शकत नाही. म्हणून राम जेव्हा तिला समजावतात की वनवासातले जीवन अत्यंत कठीण आणि दुःखदायक आहे. तेव्हा तू अयोध्येतच राहा. त्या प्रसंगी क्षणाचाही विचार न करता सीता म्हणते निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता.

इतकी ती राममय झाली आहे. राम आणि सीता यांची शरीरे फक्त वेगळी आहेत. आत्मा एकच आहे. ते एकजीव झालेले आहेत. एवढेच नाही तर सीता ही रामाची शक्ती देखील आहे. सीतेशिवाय राम अपूर्ण आहे. म्हणून तो सीताराम आहे. त्यामुळे श्रीराम आपल्यासोबत वनवासात सीतेला घेऊन जातात. जसा राम हा सर्व बाबतीत आदर्श आहे तशीच सीता सुद्धा. ती आदर्श पत्नी, आदर्श माता, आदर्श सून, आणि आपल्या दिरांवर पुत्रवत प्रेम करणारी वहिनी आहे.

सीतेला रामाच्या पराक्रमावर कधीही न ढळणारा विश्वास आहे. म्हणून वनवासात जेथे हिंस्त्र प्राणी आहेत, राक्षसांची भीती आहे अशा ठिकाणी सुद्धा रामाच्या पराक्रमावर श्रद्धा असणारी सीता त्याच्या खांद्यावर विश्वासाने मान ठेवून निर्धास्त आहे. निर्भय आहे. एवढेच नाही तर वनवासातील हा रामासोबतचा काल तिच्या जीवनातला आनंददायक आणि सुखकारक असा काल आहे कारण या काळात आपल्या प्रिय राघवाबरोबर तिला राहायला मिळते.  त्यापुढे राजप्रासादातील आणि स्वर्गातील सुखे देखील तिला तुच्छ आहेत.

रामाच्या पराक्रमावर तिचा किती विश्वास असावा, आणि रामावर तिचे किती प्रेम असावे याची साक्ष देणारा एक प्रसंग रामायणात आहे. रावण तिला पळवून घेऊन जाताना आपल्या शौर्याचे वर्णन तिच्यापुढे करतो. तो म्हणतो की मी देवांना सुद्धा बंदी बनवले आहे. तेव्हा सीतेने त्याला दिलेले उत्तर अतिशय सुंदर आहे. ती म्हणते, ‘ तू कसला शूर आणि पराक्रमी ? तू तर सिंहीणीचे हरण केले आहेस. एखाद्या कोल्ह्याप्रमाणे . माझे पती राम म्हणजे नरसिंह आहेत. आणि कोल्हा कधीही सिंहाची बरोबरी करू शकत नाही. ‘ किती सुंदर आणि बाणेदार उत्तर आहे. तेही रावणासारख्या महापराक्रमी पुरुषाला न घाबरता धिटाईने दिलेले.

आता तिला रावणाने पळवून नेल्यानंतर रामाची काय अवस्था होते ? तर तो प्रचंड शोकविव्हल होतो. सीतेचा विरह त्याला सहन होत नाही. जणू रामाची शक्तीच हरवते. असे त्या दोघांचे एकमेकांवर अतिशय प्रेम असते.  रावणाच्या लंकेत काही काळ काढला म्हणून ती अपवित्र झाली असे लोकांनी म्हणू नये म्हणून सीता अग्निपरीक्षा देते. तिच्या मनात एका रामाशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार नसतो. म्हणून तर अमर अशा पाच पतिव्रतांमध्ये सीतेचे नाव घेतले जाते. अर्थात रामाच्या मनात तिच्याबद्दल कोणतीही शंका नसते. ती पवित्र आहे हे राम जाणून होता. लोकांना असे वाटते की राम जर आदर्श पती असेल तर त्याने सीतेचा त्याग का केला ?

त्याचे उत्तर असे देता येईल की रामायण काळात राजघराण्यातील व्यक्तींबद्दल, त्यांच्या चारित्र्याबद्दल आपली मते व्यक्त करण्याची लोकांना मुभा होती. आताही आपण जी रामायण मालिका पाहतो आहोत, त्यातही दशरथ, कैकयी, भरत इ बद्दल चर्चा करताना लोकांना वेळोवेळी दाखवले आहे. अशाच पद्धतीने सीता परत आल्यानंतर नगरवासी तिच्याबद्दल चर्चा करत होते. रामाच्या कानावर ही वार्ता येते. कोणा एका व्यक्तीच्या सांगण्यावरून रामाने सीतेचा त्याग केलेला नाही तर अयोध्यानगरीतील अनेक पौरजनांच्या मनात ही शंका होती.

या ठिकाणी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की त्यावेळी राम हा केवळ पती नव्हता. तो राजा देखील होता. या प्रसंगाच्या निमित्ताने त्याचा पतिधर्म आणि राजधर्म यात संघर्ष निर्माण झाला आहे. आणि आपल्याला हे माहिती आहे की राम कधीही भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेत नाही. रामायणातले अनेक प्रसंग त्याची साक्ष देतात. तो आधी प्रजाहितदक्ष आणि कर्तव्यकठोर राजा आहे आणि बाकीच्या सगळ्या भूमिका नंतर. जेव्हा कुटुंब आणि राष्ट्र यांच्यात निर्णय घेण्याचा प्रश्न येतो, तेव्हा कुटुंबाच्या स्वार्थाचा त्याग करून राष्ट्रभावनेला परमोच्च महत्व दिले पाहिजे. ‘ ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत ‘ रामाने तेच केले. आपल्या राज्यासाठी त्याने हा सर्वोच्च त्याग केला. रामाने पत्नीचा नव्हे तर राजाने राणीचा त्याग केला आहे. रामाच्या मनात पत्नी म्हणून सीतेचे स्थान कायमच आहे. रामाच्या या स्वभावाची सीतेला देखील कल्पना होती. म्हणून तिला आपल्यावर हा झालेला अन्याय आहे अशी तिची तक्रार नव्हती.

रामाने तिचा त्याग केला असता तर त्याला दुसरे लग्न करता आले असते. यज्ञाच्या वेळी दुसरी पत्नी करता येते असे रामाला सांगितले गेल्यावर सुद्धा राम त्या गोष्टीला स्पष्टपणे नकार देतो. तो म्हणतो की रामाच्या हृदयसिंहासनावर एकाच व्यक्ती पत्नी म्हणून विराजमान आहे. आणि ती म्हणजे फक्त सीता. म्हणून दुसरे लग्न न करता सीतेची सोन्याची मूर्ती तयार करून यज्ञाला बसतो. इतके प्रेम रामाचे सीतेवर आहे. त्यामुळे तो जेव्हा राजाच्या भूमिकेत होता, तेव्हा राजाचे कर्तव्य त्याने पार पडले. आणि पतीच्या भूमिकेत होता, तेव्हा एका सीतेशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार त्याच्या मनात नव्हता. म्हणून तो आदर्श पती सुद्धा आहेच. राम आणि सीता यांचे सहजीवन आदर्श सहजीवनाचा एक सुंदर नमुना आहे. आणि राम सीता ही  एक अलौकिक प्रेमकथा सुद्धा.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ फादर्स डे… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

फादर्स डे☆ सौ कल्याणी केळकर बापट

कुठल्याही गोष्टी चा सुवर्णमध्य हा निश्चितच चांगला असतो. कुठलीही टोकाची भूमिका, मते ही बरेचवेळा चुकीच्या मार्गाने जाण्याची संभावना असते. हा नियम वाढदिवस साजरे करणे, विशिष्ट दिवस साजरे करणे ह्याला लागू पडतो. मान्य आहे काही नाती अशी असतात की त्याला विशिष्ट दिवशीच महत्व असतं अस नसतं पण ते साजरे केले तर तो दिवस ती व्यक्ती, ते नातं आपल्या मनात दिवसभर रुंजी घालून आपला दिवस आनंदात घालवत हे पण खरं.

१६ जून !  फादर्स डे.  मला बाबांची आठवण, त्यांच्या बरोबर घालवलेला काळ हा संपूर्णपणे आठवतो, अजूनही त्यांना भेटून त्यांच्याशी बोलून खुप आनंद मिळतो. पण खास करून त्यांच्या वाढदिवशी म्हणा किंवा फादर्स डे ला ते संपूर्ण दिवसभर मनात असतात.

बाबा”हा शब्द दिसायला छोटा, अगदी साधासरळ,सुटसुटीत. पण ह्या इटुकल्या पिटुकल्या शब्दांत काय काय सामावलेलं असतं बघा.ह्या शब्दांत असतं प्रेम,जिव्हाळा, भक्कम आधार, संकटकाळी मौनातून मिळणारा दिलासा.म्हणूनच की काय सहसा मूल जे सुरवातीचे एक दोन शब्द बोलायला शिकतो त्यात”बाबा हा शब्द असतोच असतो.

“बाबा”ही व्यक्ती अशी असते नं तिच्याबद्दल आईवर वा आईशी बोलतो तितकं भरभरून बोलल्या जात नाही .पण मनाचा एक अख्खा पूर्ण कप्पा आपल्या बाबांनी व्यापलेला असतो.त्यांच्याबद्दल भरभरून शब्द बाहेर पडत नाहीत पण मौनातल्या आणि मनातल्या ह्या प्रेमाची,हक्काची,खंबीर पाठींब्याची पकड जबरदस्त असते. बाबा हा प्रत्येकाचा असा नाजूक कोपरा असतो नं मग ते बाबा अति अति विख्यात लता मंगेशकर ह्यांचे असोत की माझ्या सारख्या अति अति सामान्य साधना केळकर हिचे असोत. बाबा इज बाबा !  खरचं वडीलांची जागा आपल्या सगळ्यांसाठीच स्पेशल.

मला नं बाबा असा उल्लेख आला की नेहमी कवी “बी”ह्यांची “गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या”ही कविता आठवते. ह्या कवितेचं वर्णन करायचं तर ही भावपूर्ण अर्थ असलेली अफाट लोकप्रियता लाभलेली कविता असं म्हणता येईल.  ह्या कवितेची आठवण म्हणजे आम्हां भावंडांना पाळण्यावर झोपवितांना बाबा त्यांच्या सुरेल आवाजात आम्हाला ऐकवतं. तेव्हा ही कविता बाबांच प्रेम,ते करीत असलेले लाड,त्यांनी केलेले कौतुक झेलीत खूप आवडायची. अर्थ समजायच तेव्हा वयचं नव्हतं. पण ती कविता बाबांनी ऐकविल्याशिवाय आम्हाला झोपच यायची नाही. पुढे बाबा आमच्या मुलांना झोपवितांना,खेळवितांना  ही कविता गायचे तेव्हा त्यातील शब्दनशब्द खरोखरच अंतर्बाह्य हलवून जायचा, ह्यातच ह्या कवितेची महती आली.

माहेरी जातांना प्रत्येक खेपेला आम्ही घरी पोहोचण्याच्या नेमक्या वेळी बाबा व-ह्यांडात पेपर हातात घेऊन बसलेले असतात. हातात पेपर,नजर मात्र रस्त्याकडे,आमची वाट बघत असलेली,कान आमची चाहूल घेत असतात. हे क्षण आम्हा माहेरवाशिणींसाठी लाखमोलाचे बरं का. सहसा मुलांना वडिलांकडून खूप अपेक्षा असतात.पण एका इंटरव्ह्यू मधील अनुराग कश्यप चे वाक्य मनाला खूप भिडून गेले ते म्हणाले,” जितक्या वर्षांचे आपण स्वतः असतो तितक्याच वर्षांचं आपल्या बाबांचं वडीलपणं असतं. आधी ते माणूस असतात मग आपण झाल्यावर ते बाप बनतात”.  खरचं ह्या अँगलने कधी विचारच आला नव्हता मनात. संसारात दोघेही कमावते असले तर एकावर आर्थिक बाबतीत पूर्ण ताण येत नाही.  त्यामुळे बाबा नेहमी त्यांच्या कार्यालयातील सहका-यांना आर्थिक मदत करायचे.अशा कित्येक लोकांच्या अडीनडीला ते धाऊन जात आणि ते ही अगदी कुणालाही न सांगता. त्यांनी केलेली मदत ह्या हाताची ह्या हाताला देखील कळतं नव्हती. जेव्हा ते लोक पैसे परत करुन आभार मानायला येतं तेव्हाच कळायचं. अशात-हेने कित्येक सहका-यांच्या मुलांच्या शिक्षणात तसेच लग्नकार्यात ह्यांच्या मदतीचे योगदान असायचे.

देव कधी भेटला तर एक मागणं नक्कीच .

“आयुष्य कृष्णधवल असलं तरी,

स्वप्नांने रंग आपणच भरावेत,

जन्म कुठलाही मिळाला तरी,

जन्मोजन्मी बाबा मात्र तुम्हीच असावेत,

बाबा मात्र तुम्हीच असावेत।।।।

Happy father’s day Baba

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “घड्याळ…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “घड्याळ…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

जेवतांना सहज घडाळ्याकडे लक्ष गेल. आज पर्यंतच्या आयुष्यात घड्याळ किती वेळा पाहील हे मोजताही येणार नाही. पण आज पाहिल आणि घडाळ्यातील तीन काट्यात आणि परिवारात काहितरी साम्य जाणवल.

घडाळ्यात तासकाटा,मिनीटकाटा, आणि सेकंदकाटा असतो. तसच परिवारातील तासकाटा म्हणजे वडील,मिनीटकाटा म्हणजे आई,व सेकंदकाटा म्हणजे मुलं असल्याचं जाणवल.

या प्रत्येक काट्याला फिरण्याची आपली गती असली तरी प्रत्येकाची गती वेगळी पण दिशा मात्र एकच आहे. पण प्रत्येकाच्या गतीचे एक वर्तूळ पुर्ण झाल्याशिवाय तास पुर्णत्वास येऊ शकत नाही.

परिवारातील वडील म्हणजे तासकाटा,याची गती सगळ्यात कमी असली तरीही तो एका ठाम गतीने व ऊद्देशाने पुढील तासाच्या आकड्याकडे सरकत असतो. पण तास पुर्ण झाल्याशिवाय त्याची गती लक्षातच येत नाही. त्याच प्रमाणे वडीलांचे काम असते. ते एक एक ध्येय डोळ्यासमोर ठेऊन ठामपणे आपला प्रवास करीत असतात. आणि ध्येय पुर्ण झाल्यावरच त्यांची गती लक्षात येते.

आई म्हणजे मिनीटकाटा असते. प्रत्येक मिनिटाला (अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत) तीची गती जाणवत असते. ती सतत चालत, विचारमग्न, आणि कार्यमग्न असते. मिनीटकाटा जस फिरताना कधी तास काट्याच्या मागे असतो, थोड्यावेळाने थोडाकाळ तो तास काट्या बरोबर थांबतो,व परत तास काट्याला मागे टाकून त्यांची ओढ सेकंद काट्याकडे असते, अगदी तसेच आईचे असते. सतत कामात असतांना नवऱ्याच्या मागे पडल्यावर ती पुढे येऊन नवऱ्याला गाठून काही काळ नवऱ्याच्या बरोबरीने घालवते,व नंतर परत मुलांचे सगळे करायचे आहे या प्रेमापोटी मुलांच्या (सेकंदकाट्याच्या) मागे जाऊन त्यांच्या बरोबरीने राहण्याचा प्रयत्न करते.

आणि सेकंदकाटा म्हणजे आपली मुलं. ती कितीही मोठी झाली तरीही आई-वडिलांच्या मागे पुढे कायम ऊत्साहाने तुरूतुरू पळतांना,खेळताना,बागडताना दिसतात. ती सतत तासकाटा आणि मिनीटकाटा (वडील आणि आई) यांच्या मध्येच धडपडतांना दिसतात. त्यांचा पुढे पुढे सरकण्याचा वेगही वडील आणि आई यांच्या पेक्षा जास्त असतो.

जसे घड्याळाला तीन काटे व त्यांच्या एकाच दिशेच्या गतीशीवाय पुर्णत्व येत नाही,तसेच अगदी आपल्या कुटुंबाचे आहे. या तीन काट्याप्रमाणे आपल्या कुटुंबातील वडील,आई, आणि मुल यांची गती एकाच दिशेला असल्याशीवाय घराला पुर्णत्व येत नाही.

पण लक्षात ठेवा,सेकंद, मिनिटे,तास यामुळे दिवस, आठवडे, महिने,वर्ष हे पुर्ण झाले तरी यासाठी काटे आपली चौकट (घड्याळाची तबकडी) सोडत नाहीत. तशीच आपण आपल्या कुटुंबाची चौकट सांभाळायला पाहिजे. एक जरी काटा चुकला तरी वेळ चुकते. तसेच कुटुंबातील एक जरी सदस्य (काटा) चुकला तर कुटुंबाचे घड्याळ बिघडून गोंधळ उडेल.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी वैयक्तिक व सामाजिक जबाबदारी – भाग २ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी वैयक्तिक व सामाजिक जबाबदारी – भाग २ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(निबंध स्पर्धेतील प्रथम पुरस्कार प्राप्त निबंध)

(मला माणसाला विचारावसं वाटतं, “तुमची जीवनदायी मी  माझे उपकार फेडणार, कृतज्ञ होणार, की माझ्या अस्तित्वाशीच खेळणार रे ? माझ्या अस्तित्वाची भवितव्याची मला घोर काळजी लागलीय.)

नदीची अशी व्यथा ऐकत असताना मन बेचैन झालं तिच्याविषयी सहानुभूती आणि काळजी वाटायला लागली पुढील पिढ्यांना काय सांगायचं असं वाटायला लागलं तिच्या व्यथा निराकरण आणि उपचार गांभीर्याने करायला हवेत

त्यांना आरोग्यदायी करायला हवं तरच जीवसृष्टीचे आरोग्य चांगले राहणार आहे एका व्यक्तीपासून म्हणजे स्वतःपासून पुढे कुटुंबापासून सुरुवात करायला हवी . उत्सव सणवार याचे निर्माल्य,

तसेच मृत्यू पावलेल्यांच्या अस्थी, रक्षा या गोष्टी नदीत विसर्जन करतात .ते टाळण्यासाठी समुपदेशन करणे अत्यंत

गरजेचे आहे. नदीमध्ये जनावरे धुणे, कपडे धुणे कसे अपायकारक आहे, हे समजवायला हवे .गणपती उत्सवाच्या वेळी मूर्तींना दिले जाणारे रंग विषारी असतात. प्लास्टरच्या मूर्ती विरघळत नाहीत. जलचरांना या गोष्टींचा धक्का पोहोचतो. पूर्वी कुंभाराच्या मातीचे ‘ गणोबा ‘ केले जायचे. ( लहान मूर्ती ) त्याचीच पूजा केली जायची. त्याला रंग नसायचा .जल प्रदूषणाचा प्रश्न नव्हता .पंचगंगा नदी तर जलपर्णीने झाकून गेल्याने तिचा प्रवाहच दिसत नाही ,अशी अवस्था आहे .कोयना प्रकल्पामध्ये काम केलेल्या श्री वी. रा .जोगळेकर यांनी जलपर्णी पासून उत्तम कंपोस्ट खत बनवले. असे प्रयोग ,त्याचा प्रचार आणि प्रसार व्हायला हवा. चांगले आचरण आणि शुद्ध विचारांचा सर्वांनी अंगीकार करायला हवा. नद्यांचे संरक्षण करून त्यांना पुनरुज्जीवन  द्यायला हवे. राजस्थानचे एक आदर्श उदाहरण म्हणून अंगीकार करायला काहीच हरकत नाही.

व्यष्टी पासून सुरुवात करून, समष्टी पर्यंत प्रत्येकाने जबाबदारी घ्यायला हवी. भारतीय संस्कृतीचा आणि सभ्यतेचा आधार म्हणून नदी शुद्धीकडे पाहायला हवे. नद्यांच्या काठावर बांबूची झाडे लावायला हवीत. कारखान्यांमधून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया प्लांट उभे करणे व ते कार्यरत ठेवणे सक्तीचे करायला हवे. अन्यथा कडक शासन आणि मोठे दंड करायला हवेत .याबाबत सांगायचं तर पैशाच्या आमिषाने सगळे कायदेभंग करून कारखाने खुशाल घाण पाणी नदीत सोडतात. तात्पुरती डागडुजी होते. पुन्हा तोच प्रकार चालू राहतो .आणि नदीवर माशांचा खच दिसायला लागतो. कोण कोणाला जबाबदार धरणार!. प्रथम भ्रष्टाचार बंद व्हायला हवा. अलीकडे कृष्णा प्रदूषणाबद्दल, काही सहकारी साखर कारखान्यांना चार कोटी 46 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. (प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून) तसेच सांगली महापालिकेला लागू होणाऱ्या दंडाची रक्कम मोठी असल्याने त्याची गणती करण्यासाठी मुदत मागितली गेली. शहरातील सांड पाण्यावर प्रक्रिया व्हायला हवी .साखर कारखान्यांनी सोडलेल्या पाण्यात 1000 ते 1500 मिलिग्रॅम पर्यंत बी . ओ. डी . सेंद्रिय पदार्थ, मळीपासून अल्कोहोल तयार करणाऱ्या आसवाणी मधून  स्प वॉश नावाचे अत्यंत दाहक लाल सेंद्रिय पदार्थ असलेले क्षार असणारे सांडपाणी बाहेर पडते. त्याचा सर्वात जास्त (बि.ओ.डी. चार हजार ते पाच हजार मि. लि.) प्रदूषणाचा धोका असतो. स्पेसमड या टाकाऊ घनपदार्थाच्या मिश्रणातून कंपोस्ट खत बनविण्याचा प्रकल्प करायला हवा. शहराच्या सांडपाण्यावर म्हणावे तितके लक्ष दिले जात नाही. उपसा व शुद्धीकरणातही बऱ्याच त्रुटी आहेत. बंधाऱ्यांमुळे प्रवाह नसल्याने हवेतील ऑक्सिजन योग्य प्रमाणात पाण्यात मिसळत नाही . तसेंच रेठरे नाला आणि शेरी नाला यांचे प्रश्न अजून चालूच आहेत. शेतकरी शेतीला भरमसाठ नको इतके पाणी पाजतो. एक तर जमीन खराब होते. आणि खते कीटकनाशके मातीत मुरून ते पाणी नदीत उतरते .रसायनिक खतांपेक्षा सेंद्रिय खतांच्या वापराबद्दल समुपदेशन व्हायला हवे. नवीन उद्योगधंद्यांना परवानगी देताना, त्यावर प्रदूषण मंडळांनी कडक बंधने घालायला हवीत. वाळू तस्करांवर कडक कारवाई करायला हवी.आदर्श उदाहरण म्हणून देता येईल . किर्लोस्कर ऑइल इंजिनच्या सामाजिक बांधिलकी, उपक्रमाच्या माध्यमातून मोरेवाडी आणि राजेंद्र नगर या कोल्हापूरच्या उपनगर परिसरातून वाहणाऱ्या सांडपाण्यावर जलशुद्धीकरणाच्या एक छोटा प्रयोग आणि प्रयत्न केला आहे आणि तो यशस्वी झाला आहे .हे सांडपाणी शिवाजी विद्यापीठ परिसरातून पुढे जयंती नाल्याला मिसळते .आणि पुढे ते पंचगंगा नदीत जाते .मोरेवाडी आणि राजेंद्रनगर येथून जे पाणी वाहते, त्याच ठिकाणी लुप्त झालेली ‘ ‘गोमती ”  नदी आहे .या प्रवाहाचे पात्र न बदलता , तेच पाणी दोन तीन ठिकाणी वळवून घेऊन, वरच्या भागातला प्रवाह स्वच्छ करून, थोडा रुंड केला .तीन चार ठिकाणी दगडी भिंती, बांध घालून नैसर्गिक रित्या गाळणीची प्रक्रिया केली. तीन-चार ठिकाणी पाणी स्थिर झाल्याने ऑक्सिडेशन ची प्रक्रिया जलद व्हायला लागली. दुर्गंधी कमी झाली .तिथेच एक लाख लिटर पाणी मावेल असा खड्डा खणला ,आणि त्यामध्ये पाणी साठवण होत आहे. असे प्रयोग अनेक ठिकाणी राबवता येतील .रोज प्रक्रियाविना हजारो लिटर पाणी जयंती नाल्यात मिसळत होते. ते स्वच्छ होऊन वापरात आले. मोठमोठी झाडे व पक्षांचा अधिवास वाढला .एक नवी परिसृष्टी  विकसित होताना दिसत आहे .यासारखे प्रयोग त्याचा प्रचार आणि प्रसार सर्वत्र व्हायला हवा.

आज 75 नद्यांच्या पुनरुज जीवनासाठी निधी मंजूर झाला आहे .पण त्यावर कृती व्हायला हवी .प्रत्येक गाव ,तालुका, जिल्हा ,राज्य, आणि देश अशा पातळीवर कृती व्हायला हवी. जागतिक स्तरापर्यंत ,” पाणी आणि नद्या” यावर परिषदा घ्यायला हव्यात .नदी – -समाज– शासन यांचा समन्वय साधायला हवा .नद्यांवर लिहिलेल्या पुस्तकांची प्रसिद्धी व्हायला हवी. नदी स्वच्छतेविषयी काढलेली पत्रके घरोघरी वाटप करून लोकांमध्ये जागृती व्हायला हवी. शालेय पातळीवर प्रत्येक इयत्तेत हा विषय शिकवायला हवा. चार भिंतीत शिकवत असताना पंधरा दिवसात किंवा महिन्यात मुलांना नदीवर नेऊन सर्व गोष्टी दाखवायला हव्यात .नद्या पुन्हा अमृतवाहिनी ,शुद्ध ,निर्मळ ,पवित्र व्हाव्यात या दृष्टीने आराखडे केले जात आहेत .” चला जाणूया नदीला” अभियान सुरू आहे. निसर्ग प्रतिष्ठान ,माझी माय कृष्णा   (,महाराष्ट्रात ) ,आभाळमाया, देवराई फाउंडेशन ,नेचर कॉन्सर्वेशन,  यांनी चळवळ सुरू केली आहे .गंगाशुद्धीसाठी जपानने हात पुढे केला आहे. सामाजिक प्रयत्न चालू आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे .

हे काम एकट्या दुखट्याचे नाही, तर व्यक्ती ते समाजापर्यंत प्रत्येकाने , ” सहना ववतु सहनौभुनक्तु अशी जबाबदारी स्वीकारायला हवी. पाणी हे जीवन समजून, नदीला जीवनदायिनी समजून निरामय जीवन जगायचंय. मग सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत ना? झालेली घाण काढून नवीन घाण नदीत जाणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यायला हवी. नद्यांच्या जलप्रवाहाचा खळखळणारा मधुर आवाज, संगीत पूर्वीप्रमाणेच ऐकायला मिळावं असं प्रत्येकालाच वाटतं ना !नदी म्हणते,

 गंगा यमुना गोदा कृष्णा.

 तृप्त करतो सजीवांची तृष्णा.

 विकसित झाली इथे संस्कृती.

 बांध घालूनी वीज निर्मिती.

 असूनही आम्ही जीवनदायीनी.

  भय अस्तित्वाचे संपत नाही.

  वंदन करिते देवा तुजला.

  सदबुद्धी दे या मानवाला.

— समाप्त — 

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी वैयक्तिक व सामाजिक जबाबदारी – भाग १ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी वैयक्तिक व सामाजिक जबाबदारी – भाग १ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(निबंध स्पर्धेतील प्रथम पुरस्कार प्राप्त निबंध)

गंगेच, यमुनेचैव, गोदावरी सरस्वती।

नर्मदे , सिंधू ,कावेरी ,जलेस्मिन संन्निधिं कुरु ।।

दररोज सकाळी देवाची पूजा करत असताना, देवा जवळच्या कलशात सर्व नद्यांना आपण आवाहन करतो. त्यावरूनच नदीचे महत्व किती आणि कसं असतं पहा बरं!

पण आज ती व्यथित आणि दुःखी झालीय . तिची व्यथा कोणी तिर्हायितानी सांगण्यापेक्षा तिने स्वतः सांगितली तर ते जास्त सयुक्तिक ठरेल. आणि मग तिच्या व्यथेवरील उपचार, व्यष्टी ते समष्टी पर्यंत कसे आणि काय करायचे याचा विचार करावा लागेल .ती स्वतःची महानता प्रथम सांगायला लागली .भारतीय संस्कृतीमध्ये आम्हाला देवत्व दिलं.राष्ट्रगीतातही नावं घेतली. ऋग्वेदामध्ये आमच्या अनेक प्रार्थना आहेत. आम्हाला केवळ पाण्याचा प्रवाह न मानता, ईश्वरी तत्त्वाचा अविष्कार , देवता स्वरूप मानून, मंदिरं बांधली. मानव, प्राणी, पक्षी, जंगलं, शेती, वीज निर्मिती, जल पर्यटन किती किती सांगू ! या सगळ्यांच्या जीवनदायीनी आहोत आम्ही! स्कंद पुरणात एक श्लोक आहे”, न विभाती  नदी हीनो पृथ्वीय भूसुरत्तमं। नदीहीनो हय्यं देश प्रसिद्धोपि न शोभते”।। देशातल्या जणू रक्तवाहिन्या आहोत आम्ही.

पण हाय ,हाय! ही सगळी माझी महानता असली तरी आज माझी काय दूरदशा आहे, असं म्हणण्यापेक्षा, या माणसाने काय दुर्दशा केलीये असं म्हणावं लागेल .मी, आम्ही अमृत गंगा. पण घाणीची अंघोळ घालून विषगंगा करून टाकलय आम्हाला .त्यामुळे माझ्या अंगा खांद्यावर खेळणारे मासे, कासव, मगरी, वगैरे जलचर आजारी पडून मरत आहेत. आणि ते खाऊन माणसंही मेंदू आणि पोटाच्या विकाराने आजारी पडत आहेत. चार लाख लोक मृत्यू पावत आहेत. आणि ही गोष्ट डब्ल्यू. एच. ओ. चा अहवालच सांगतो. शहरांमधली विसर्जित केलेली घाण, कचरा ,औद्योगिक उत्सर्जक वस्तू, किरणोत्सारी पदार्थ माझ्या पोटात टाकून माझी नरकावस्था करून टाकलीय. कुठवर सहन करू मी हे सगळं? 2009 मध्ये केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या अहवालात माझ्यासह दीडशे अशा माझ्या भगिनी प्रदूषित असल्याच सांगितलंय. आणि 2019 मध्ये ती संख्या 300 इतकी झाली . हे चित्र जीवसृष्टीचा संकट काळ जवळ येत असल्यासच आहे ना? मला माणसाला विचारावसं वाटतं, “तुमची जीवनदायी मी  माझे उपकार फेडणार, कृतज्ञ होणार, की माझ्या अस्तित्वाशीच खेळणार रे ? माझ्या अस्तित्वाची भवितव्याची मला घोर काळजी लागलीय.

क्रमशः… 

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मी एक असमंजस… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

मी एक असमंजस ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

या पूर्वी माझा डोळसपणा व माझा कानसेन पणा आपण वाचला आहे. आज तर मला माझ्या समजुती की गैरसमजुती ? शहाणपणा की मूर्खपणा ? यातच गोंधळ होऊ लागला आहे. आणि मी सामान्य नसावी असे वाटू लागले आहे. हे असे वाटण्याची कारणे पण सांगते. मलाच माझ्यावर शंका येऊ लागली आहे.

तर काही दिवसांतील अनुभव सांगते. मी अनेक वर्षे सकाळी लवकर चालायला जात असते म्हणजे आपले मॉर्निंग वॉक. तर यात विशेष काय? सगळेच जातात ना ? असे मला वाटते. पण चालायला आल्यावर छान निसर्ग ( असेल तर ) बघावा. गवतावर चालावे, फुलांचा,गवताचा,झाडांचा मंद सुगंध भरून घ्यावा. स्वतःशी मस्त संवाद करावा. काही काळ फोन,इतर साधने यांना विश्रांती द्यावी. अशी माझी समजूत आहे. म्हणून मी फोन शक्यतो घरी ठेवते. पण यात रमणारी मी मूर्ख ठरते. कारण बघावे त्यांच्या कानात निरनिराळी बटणे ( आपले हेडफोन्स ) दिसतात. एकदा तर चांगलीच गंमत झाली. माझ्या शेजारून चालणारी मुलगी अचानक माझ्याशी बोलू लागली. मला तेच हवे असते. मी कुठेतरी वाचले होते, दोन माणसे एकमेकांशी बोलत आहेत हे सर्वात सुंदर दृश्य आहे. मी तर माणूस वेडी. ती बोलत आहे हे बघितल्यावर मी पण बोलू लागले. आणि थोड्याच वेळात ती माझ्याकडे विचित्र नजरेने बघू लागली. कारण ती त्या बटण सदृश्य हेडफोन मधून अनेक कि.मी. जवळ असलेल्या व्यक्तीशी बोलत होती. आणि मी तिच्याशी. मग माझ्या विषयी तिचे गैरसमज होणारच. अजून एक गंमत अनुभवास येते. बरीच मंडळी जाता येता झाडाची पाने तोडतात व काही अंतरावर टाकून देतात. हे बघून मला मात्र वाईट वाटते. असे वाटते त्या झाडांनी तुमचे काय बिघडवले आहे? तसे सांगण्याचा प्रयत्न केला तर लोक विचित्र नजरेने बघतात. काही मंडळी तर गवतावर बसतात. आणि हाताने त्याच जागेवरचे गवत उपटतात. बरेचदा आपण हे करत आहोत हे पण त्यांच्या लक्षात येत नाही. मी लक्षात आणून दिले की तेच विचीत्रपणे बघणे अनुभवते.

माझा अजून एक मूर्खपणा सांगते. त्याच मॉर्निंग वॉक वरून परतत असताना मला एक वेगळाच छंद जडला आहे. ज्यांचे नळ चालू आहेत व पाणी वाया जात आहे ते बंद करायचे. ज्यांच्या पाण्याच्या टाक्या ओसंडून वहात आहेत त्यांना त्यांच्या घरात जाऊन सांगायचे व वाहणारे पाणी बंद करायला लावायचे. आणि रस्त्यावर वाहणाऱ्या नद्या बंद करायच्या म्हणजेच रस्ते स्वच्छ करणे थांबवायचे. आहे ना वेडेपणा? कारण आम्ही बिल भरतो, आमचा नळ आहे तुम्हाला काय करायचे आहे? अशी मुक्ताफळे ऐकून घ्यावी लागतात. तरी मी काही सुधारत नाही. याच पाण्या बाबत आमचा वेडेपणा सांगते. तर आम्ही काय करतो ते सांगते म्हणजे तुम्हाला पण पटेल. आम्ही  डाळ,तांदूळ,भाज्या धुतलेले पाणी एका छोट्या बादलीत घेतो आणि ते कुंड्यातील झाडांना घालतो. कपडे धुतलेले पाणी सडा टाकायला वापरतो. कपडे पिळलेले पाणी संडास,बाथरुम धुवायला वापरतो.पाणी प्यायला देताना शक्यतो अर्धा ग्लास देतो. लागले तर पुन्हा देता येते. आणि तरीही उरलेच तर एका भांड्यात साठवतो. ते कुठेही वापरता येते. गाड्या नळीने न धुता अशा साठवलेल्या पाण्यातून धुणे/पुसणे करतो. पण पक्ष्यांना मात्र एका मोठ्या भांड्यात आवर्जून पाणी ठेवतो.

आहे ना वेडेपणा?

हीच गोष्ट लाईटची घराबाहेरील लाईट रात्र रात्र चालू असतात. बरे हे काम करायला रस्त्यावरील सरकारी दिवे चालू असतात. काहींच्या घरात संडास, बाथरुम यातील लाईट चोवीस तास चालू असतात. आपल्याला खटकले आणि विनंती करून सांगितले तरी उत्तर तेच मिळते. आम्ही बिल भरतो. आमच्या घरात किंवा बाहेर लाईट ठेवतो. तुम्हाला काय करायचे आहे? आम्ही मात्र प्रत्येकाच्या हाताला व मनाला सवय लावून घेतली आहे, ज्या खोलीतील काम होईल त्या खोलीतील लाईट बंद करायचे. आहे ना वेडेपणा?

एक असाच वेडेपणा नुकताच अनुभवला. मतदान करण्यासाठी सुट्टी मिळाली होती. शनिवार रविवार याला जोडून सुट्टी होती. म्हणजे उत्तम योग. आणि त्याचा फायदा उच्च विद्या विभूषित हुशार लोकांनी घेतला. मस्त जोडून रजा घेऊन छान थंड हवेची ठिकाणे गाठली की. आणि आमच्या वयाची काही मूर्ख माणसे ७/८ तास प्रवास करुन मतदानासाठी पोहोचली. आणि आमच्या सारखे कर्मचारी तर ऊन,तहान सगळे विसरून,स्वतःला होणारे त्रास विसरुन मतदान अधिकारी म्हणून काम करत होते. आहे ना मूर्खपणा?

असे बरेच वेडेपण आहे. जाता जाता अजून एक वेडेपणा सांगते. हल्ली मस्त रात्री केक कापून मोठ्या आवाजात गोंधळ करुन  Happy Birthday साजरा करतात. केक तोंडाला फासतात. आम्ही मात्र वाढदिवस सकाळी साजरा करतो. सुवासिक अंघोळ घालतो. गोडाचे जेवण करतो. औक्षण करतो. देवळात जाऊन आशीर्वाद घेतो. एखाद्या संस्थेत त्या दिवशी जेवणाचा होणारा खर्च देतो. आहे ना वेडेपणा?

इतरांचे उच्च आवाजातील संगीत, डीजेचे व अपरात्री फटाक्यांचे आवाज ऐकणारे आम्ही. स्वतःच्या घरात कुलर लावताना त्याचा आवाज इतरांना त्रास देईल का? हा विचार करून आपला फॅन लावून झोपणारे आम्ही. आहोत ना वेडे?

तर मंडळी असे वेडेपणाचे बरेच किस्से आहेत. नमुना म्हणून काही सांगितले. आणि आपल्याच मंडळींचा सल्ला घ्यावे वाटले. म्हणून हा लेखन प्रपंच केला आहे.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग १२ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १२ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र – “युवर मेडिकल रिपोर्ट इज नॉट फेवरेबल. यू आर मेडिकली अनफिट..” रिसेप्शनिस्टचे शब्द ऐकून मला धक्काच बसला.

“यू मे कॉल ऑन अवर मेडिकल ऑफिसर डाॅ.आनंद लिमये.ही इज अ राईट पर्सन टू टेल यू द करेक्ट रिझन.” ती म्हणाली.

मी नाईलाजाने जड पावलांनी पाठ फिरवली. ‘कां?’ आणि ‘कसं?’ या मनातल्या प्रश्नांना त्याक्षणी तरी उत्तर नव्हतं. आता डॉ.आनंद लिमये हाच एकमेव आशेचा किरण होता! मला अचानक बाबांनी दिलेल्या दत्ताच्या फोटोची आठवण झाली.एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखा मी माझ्या शर्टचा  खिसा चाचपला.पण..पण तो फोटो मी नेहमीसारखा आठवणीने खिशात ठेवलेलाच नव्हता.सकाळी निघतानाच्या गडबडीत माझ्या नकळत मी तो फोटो घरीच विसरलो होतो.तीच रुखरुख मनात घेऊन मी डॉ. आनंद लिमये यांच्या क्लिनिक समोर येऊन उभा राहिलो..)

माझं तिथं येणं त्यांना कदाचित अपेक्षित नसावं.मला पहाताच ते काहीसे अस्वस्थ झाल्याचा भास मला झाला.मी तिथे येण्यामागची सगळी पार्श्वभूमी त्यांना थोडक्यात सांगितली. अतिशय पोटतिडकीने त्यांना माझी सगळी कर्मकहाणी सांगून स्टेट बँकेतली ही नोकरी या परिस्थितीत माझ्या जगण्याचा एकमेव आधार आहे हे त्यांना पटवून द्यायचा माझ्यापरीने प्रयत्न करीत राहिलो. ते काहीसे चलबिचल झाल्याचे जाणवले.

“पण तुमच्या ब्लड, यूरिन, स्टूल सगळ्याच रिपोर्ट्समधे निगेटिव्ह ईंडिकेशन्स आहेत. अशा परिस्थितीत मी फेवरेबल मेडिकल रिपोर्ट कसा देणार? आणि आता तर मी ऑलरेडी माझा रिपोर्ट ब्रॅंचला सबमिट केलेला आहे.अशा परिस्थितीत…”

“पण डॉक्टर, मुंबईला आयुष्यात मी प्रथमच आलोय. त्यामुळे हवापाण्यातल्या बदलामुळे मला नुकताच ताप येऊन गेला होता.मेडिकल टेस्टच्या एकदोन दिवस आधीच ताप उतरला होता. रिपोर्ट्समधल्या त्या त्रुटी हा त्याच्याच परिमाण असणार ना?माझी औषधं अजून सुरु आहेत आणि या त्रुटी औषधाने यथावकाश दूर होणाऱ्याच तर आहेत.मग केवळ त्यामुळे बँकेत नोकरी करण्यासाठी मी कायमस्वरूपी अनफिट कसं काय ठरु शकतो?” 

“हो, पण तुम्ही तुमच्या आजारपणाबद्दल मला आधी कल्पना द्यायला हवी होतीत ना? मेडिकल टेस्ट कांही दिवस पुढे ढकलता आली असती. अॅट धीस स्टेज… आय ॲम हेल्पलेस. सॉरी.. आय कान्ट डू एनिथिंग…”

खूप आशेने मी इथे आलो होतो. निराश होऊन बाहेर पडलो. खूप एकटं.. खूप निराधार वाटू लागलं.अंधारुन आलेल्या मनात प्रकाशाची तिरीप यावी तशी ‘त्या’ची आठवण झाली आणि… ‘त्या’नेच मला सावरलं! हो.. ‘त्या’नेच..! कारण त्याची आठवण झाली त्याच क्षणी ‘सगळं सुरळीत होईल काळजी नको’ हे बाबांचे शब्दही आठवले. मनात ध्वनित झालेल्या त्या शब्दांनी ‘तो’च मला दिलासा देतो आहे असा भास झाला आणि मी सावरलो!आता स्वस्थ बसून चालणार नाही, अखेरपर्यंत शक्य असतील ते सगळे प्रयत्न आपणच करायला हवेत याची जाणिव झाली. लहानपणापासून वेळोवेळी कानावर पडलेले बाबांचे शब्द मला आठवले आणि मी सावरलो….!मनात उमटत राहिलेले त्याच शब्दांचे प्रतिध्वनी मला दिलासा देत माझ्या विचारांना योग्य दिशा  देत राहिले…

‘त्याच्याकडे कधीच कांही मागायचे नाही. जे घडेल ते मनापासून स्वीकारायचे. खंबीरपणाने त्याला सामोरे जायचे. आपल्या हिताचे काय आहे ते आपल्यापेक्षा तोच जाणतो. आणि योग्य वेळ येताच आपल्याला तो ते न मागता देतोही. आपण कर्तव्यात कसूर करायची नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा सोडायची नाही. तो यश देतोच. क्वचित कधी अपयश आलंच, तर ते दीर्घकाळाचा विचार करता आपल्या हिताचंच होतं हे नंतर जाणवतंच…’ मनात घुमणारा बाबांचा शब्द न् शब्द मला त्या हताश मनोवस्थेत योग्य मार्ग दाखवून गेला. मनावरचं दडपण थोडं कमी झालं.

‘काहीही अडचण आली तरी बँकेच्या नंबरवर मला लगेच फोन कर’ हे निरोप घेतानाचे भावाचे शब्द मला आठवले.मनात उलटसुलट विचारांनी पुन्हा गर्दी केली…..

‘त्याला फोन करायलाच हवा. हे सगळं त्याला सांगायलाच हवं… पण.. पण कसं सांगायचं? काय वाटेल त्याला हे सगळं ऐकून? त्याने आणि घरी आई-बाबांनीही आपण आज स्टेट बँकेत जॉईन झालोय हेच गृहीत धरलंय.आता हे सगळं ऐकून काय वाटेल त्यांना..?”

मी मनावर दगड ठेवून  जवळच्याच पोस्टात गेलो. भावाला फोन लावला खरा पण रिसीव्हर धरलेला माझा हात भावनातिरेकानं थरथरु लागला. मोजक्या शब्दात सगळं

सांगतांनाही आवाज भरून येत होता. सांगून संपलं तरी क्षणकाळ त्याच्याकडून काही प्रतिसादच आला नाही. त्याला सावरण्यासाठी तेवढा वेळ तरी आवश्यक होताच.

“हे बघ, तू स्वतःला सावर. डिस्टर्ब होऊ नको. अजूनही यातून काही मार्ग निघेल” तो म्हणाला.

“नाही निघणार…”मी रडवेला होऊन गेलो..”कसा निघणार..?”

“आपण प्रयत्न तरी करु.मी माझ्या मॅनेजरसाहेबांशी बोलतो. स्टाफ डिपार्टमेंटमधे त्यांच्या चांगल्या ओळखी आहेत. ते नक्की मदत करतील. काळजी करू नकोस.मी आधी माझ्या साहेबांशी बोलून बघतो.तू थोड्या वेळाने मला फोन कर. आपण बोलू सविस्तर”

मी रिसिव्हर खाली ठेवला. त्याक्षणी मन स्वस्थ झालं. काहीतरी मार्ग निघण्याची थोडीशी कां असेना पण आशा निर्माण झाली होती.

हा आशानिराशेचा खेळ पुढे अनेक महिने असाच सुरु राहिला. अथक प्रयत्न, संपर्क,गाठीभेटी, रदबदल्या सगळं झाल्यानंतर अखेर या सगळ्या प्रकरणाला अनपेक्षित पूर्णविराम! हाती कांही न लागताच अखेर सगळं हातून निसटून गेलंच. स्टेट बँकेची पूर्वीची वेटिंग लिस्ट रद्दसुद्धा झाली आणि नवीन भरतीसाठी पेपरमधे पानभर जाहिरातही झळकली..!

केवळ भावाच्या आग्रहाखातर त्या जाहिरातीस प्रतिसाद म्हणून मी स्टेट-बँकेत पुन्हा नव्याने अर्ज केला. याच दरम्यान पूर्वी मेहुण्यांच्या ओळखीतून खाजगी नोकरीसाठी त्यांनी शब्द टाकला होता त्याची परिणती म्हणून शिवडीच्या ‘स्वान-मिल’मधल्या पीएफ् डिपार्टमेंटला मला दिवसभर चरकातून पिळून काढणारी तुटपुंज्या पगाराची नोकरी मिळाली. नव्या खेळाला नव्याने सुरुवात झाली..!

पुढे जे काही घडत गेलं ते सगळं योगायोग वाटावेत असंच होतं. पण तरीही जणू काही कुणीतरी ते मुद्दाम घडवत होतं. ‘कुणीतरी’ म्हणजे माझ्या मनात मी श्रद्धेनं जपलेला ‘तो’च होता! कारण वरवर योगायोग वाटणाऱ्या पुढे घडत गेलेल्या सगळ्याच घटना अघटीत वाटाव्यात अशाच होत्या हे माझं मलाच जाणवत होतं. आणि आत्तापर्यंत घडलेल्या या सगळ्या नकारात्मक  बारीकसारीक घटना म्हणजे ‘त्या’नेच केलेले या सगळ्या अनिश्चिततेतून मला अलगद बाहेर काढण्यासाठीचे पूर्वनियोजन होते याचा प्रत्ययही आला. पण तोपर्यंतचा संघर्षाचा काळ मात्र माझी आणि माझ्या ‘त्या’च्यावरील श्रद्धेची कसोटी पहाणाराच होता!

‘क्वचित कधी अपयश आलंच तरी ते आपल्या हितासाठीच होतं हे कालांतरानं जाणवतंच’ हे कधीकाळी ऐकलेले बाबांचे शब्द मी त्या संघर्षकाळात घट्ट धरून ठेवले होते आणि पुढे ते आश्चर्यकारकरित्या शब्दशः खरेही ठरले!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares