मराठी साहित्य – विविधा ☆ तो किनारा… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

सुश्री संगीता कुलकर्णी

? विविधा ?

☆ तो किनारा… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

प्रत्येकाच्या आयुष्यात रंगांची उधळण  होतेच असं नाही आणि ” तो किनारा प्रत्येकाला मिळतोच असंही नाही…

आयुष्याच्या कोणत्या किनाऱ्यावरून आपण आयुष्याकडे बघत आहोत यावरून आयुष्याची रंगत ठरत असावी असे मला वाटते.. काहींना अशा किनाऱ्यावरून आपलं आयुष्य खूप रंगीबेरंगी दिसतं असावं तर काहींना धवल काहींना काळं तर काहींना राखाडी… ज्यांना आयुष्य  छान रंगीबेरंगी दिसतं ना अशी माणसं भाग्यवान… !!  आयुष्याला रंग देणारे, त्यात रंग भरणारे व रंग जपून ठेवणारे  विरळचं…!!

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला अनेक किनारे असतात. आपला किनारा कोणता? हे आपल्याला शोधावं लागतं तर काही किनारे मागे सोडून आपल्याला पुढे चालावचं लागतं. … ” त्या”

किनाऱ्यापाशी आपल्याला कितीही थांबावसं वाटलं तरी नाही जमतं तर काही किनारे  आपल्याला सोडून ही  जातात. मग उरतो आपण एकटेचं.. तसं जर पाहिलंत तर आपण सगळेचं आपापल्या परीने एकटे असतो पण आयुष्याच्या या वादळात आपल्याला असा एखादा किनारा गवसतो की जो आपला असतो

आपल्यासाठीचं असतो.. .आपल्या आयुष्यात येणा-या वादळात तो आपल्याला घट्ट धरून ठेवतो. येणाऱ्या लाटांच्या प्रवाहात तो आपल्याला वाहून जाऊ देत नाही… घट्ट धरून ठेवतो…असे किनारे मिळायला भाग्य लागतं…मग आपण आपला एकटेपणा विसरतो हळूहळू.. … मग  आपण ” त्या ” किनाऱ्यावर जाऊन आपण त्याचेच होऊन जातो. त्याच्या कुशीत विसावतो हासतो रडतो मनं मोकळ करतो आणि आपण विसरून ही जातो की आपल्या “त्या” किनाऱ्याला मर्यादा ही आहेत. त्याची ही सहनशक्ती आहे. मग मनाला प्रश्न पडतो की…आपली किती वादळे त्याने पचवावी? आपल्याला त्याने किती काळ वाचवावं ?

आपला असणारा हा “जीवलगसखा एकटेपणा ” किती वेळ लांब राहणार आपल्या पासून नाही का ?….

किनारा थकतो आणि हळूहळू सुटून जातो आपल्या हातून…आपल्याही नकळत…. मग पुन्हा आपण एकटेचं उरतो.. आपलेच आपल्यासाठी आणि आपला एकटेपणा आपल्यासाठीच..

किनारा सुटण्याचं दु:ख तर असतचं पण त्याने आयुष्य तर थांबत नाही ना आपलं ? आपण जगतचं राहतो किंबहुना जगावचं लागतं म्हणा ना .. लांब असतो ” तो”  किनारा … मात्रं तो साक्षीला असतो.. येतो कधीतरी आपल्याला सावरायला… आणि कधीतरी आपण ही विसावतो त्याच्याजवळ… मन शांत होईपर्यंत..

“तो “असतो तोपर्यंत  सत्याला उराशी घेऊन एकटेपणाला सोबत घेऊन आणि” त्या”  किनाऱ्याकडे नजर ठेवून आपण जगत राहतो..जगतचं राहतो…!!

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जीवन जगण्याची कला : अध्यात्म – भाग २ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ जीवन जगण्याची कला : अध्यात्म – भाग २ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

(सर्वप्रथम आपले एकमत आहे ना की आपल्याला आपल्या जीवनात आनंद हवा आहे. सर्वाना मान्य असेल तर आपण पुढे जाऊ. धन्यवाद.)….

आपला आजचा विषय आहे जीवन जगण्याची कला:- अध्यात्म !! अर्थात कोणतीही कला शिकायची असेल तर ती शिकण्यासाठी काही नियम असणे स्वाभाविक आहे.

१. ही सृष्टी निसर्गनियमानुसार चालते

२. आपण सुद्धा यासृष्टीचे एक अविभाज्य घटक आहोत.

३.’पिंडी ते ब्रह्मांडी’ या न्यायाने वरील सर्व नियम मलाही तंतोतंत लागू होतात.

४. मी आजपासून दृढनिश्चय  केला आहे की मला ‘आनंदी जीवन जगण्याची’ कला शिकायची आहे.

५. त्यामुळे ही कला शिकण्यात यशस्वी होणे ही सर्वस्वी माझी जबाबदारी आहे.

सामान्य मनुष्याला साधारणपणे जबाबदारी झटकण्याची थोडी सवय असते असे आपल्या लक्षात येईल.  प्रत्येक गोष्ट सरकारने करावी असा त्याचा मूक हट्ट असतो. त्याला यो योग्य जागी व्यक्त करता येत नाही, त्यामुळे त्यातून अपेक्षित लाभ त्याला होत नाही आणि झालाच तर तो योग्य वेळी मिळत नाही. थोडक्यात त्याचा अपेक्षाभंगच होतो. एकदा त्याने स्वतः स्वतःची जबाबदारी घेतली तर ‘अचानक उन्हात चांदणे पडावे’ असा त्याच्यामध्ये, त्याच्या दृष्टिकोनात बदल झाल्याचे दृष्टीस पडते. कालपर्यंत नकोसे असलेले तेच जग दृष्टिकोन बदलल्यामुळे त्याला आज अधिक आकर्षक वाटू लागते.

समाजात सध्या काही शब्दांचे खरे अर्थ पुन्हा एकदा समजावून सांगण्याची गरज आहे असे जाणवते. तसेच बऱ्याच शब्दांचे अर्थ समजून घेण्यात किंवा समजून देण्यात आपण गल्लत करीत आहोत असे वाटते. त्यात प्रामुख्याने ‘धर्म’ आणि ‘अध्यात्म’ हे दोन शब्द येतात किंवा आज आपल्या विषयाशी निगडित असे हे दोन शब्द आहेत. आधी आपण धर्म म्हणजे काय ते पाहू. सध्या आपल्याकडे धर्म हा शब्द ‘पंथ’ (religion) या अर्थाने शासनाने स्वीकारला आहे आणि  शालेय अभ्यासक्रमातून तेच शिकविले गेल्यामुळे मागील पिढीपासून हाच अर्थ मनामध्ये रुजला आहे. यामुळे धर्म या शब्दाबद्दल अनेक समजुती/गैरसमजुती समाजात रुढ झाल्या आहेत असे जाणवते. जो सर्वांची धारणा करतो, तो धर्म! आपल्याकडे मातृधर्म, पितृधर्म, राजधर्म, पुत्रधर्म असे विविध धर्म सांगितले गेले आहेत. वरील शब्दांतून मनुष्याचे कर्तव्य प्रगट होते. पण सध्या पूजपाठादि कर्म म्हणजे धर्म, उपासतापास म्हणजे धर्म. सणसमारंभ म्हणजे धर्म अशा अनेक चुकीच्या समजुती समाजात रुढ झाल्या आहेत. देवळात जाणे आणि धर्मापर्यंत जाणे यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. देवळात जाणे ही भौतिक, शाररिक घटना आहे. धर्मांजवळ जाणे ही आत्मिक घटना आहे. देवळापर्यंत जाणे ही भौतिक यात्रा आहे, ही अध्यात्मिक यात्रा नव्हे. ज्याची अध्यात्मिक यात्रा सुरु होते त्याला सारी पृथ्वीचं मंदिरासारखी दिसायला लागते. आणि मग मंदिर कुठे आहे, हे शोधणं त्याला कठीण होऊन जातं. मानणं हा धर्म नाही तर जाणणं हा धर्म.

१. अध्यात्म म्हणजे भगवी वस्त्रे, अध्यात्म म्हणजे गळ्यात माळ, अध्यात्म म्हणजे जपतप, अध्यात्म म्हणजे कर्मकांड, अध्यात्म म्हणजे उपासतापास, अध्यात्म म्हणजे तिर्थ यात्रा, अध्यात्म म्हणजे दानधर्म, अध्यात्म म्हणजे देवदर्शन, अध्यात्म म्हणजे ब्रह्मचर्य, अध्यात्म म्हणजे वारी, अध्यात्म म्हणजे कथा कीर्तन, अध्यात्म म्हणजे भजन पूजन, अध्यात्म म्हणजे गुरू, अध्यात्म म्हणजे अनुग्रह/दीक्षा, अध्यात्म म्हणजे मठ मंदिर, अध्यात्म म्हणजे गूढ, अध्यात्म म्हणजे फक्त बिनकामाच्या लोकांचा उद्योग, अध्यात्म म्हणजे दासबोध, ज्ञानेश्वरी गाथा इ. ग्रंथांचे वाचन, अध्यात्म म्हणजे साठीनंतर वेळ घालवण्याचे साधन असे अध्यात्म शब्दाचे अनेक अर्थ आज समाजात रूढ आहेत. पण अध्यात्म या शब्दाच्या काही समर्पक अर्थ पुढीलप्रमाणे असू शकतील. अध्यात्म म्हणजे निरासक्ती ( detachment), अध्यात्म म्हणजे प्रतिसाद आणि सर्वात चांगला आणि सर्वाना सहज समजेल असे दोनच शब्द ‘आई’!! आनंदी किंवा अध्यात्मिक जीवन जगण्यासाठी एकतर ‘सर्वांची आई’ व्हा अन्यथा ‘सर्वांना आई’ माना.

आई म्हणजे वात्सल्य. बाळाला जन्म देऊन फारतर एखादी स्त्री जन्मदात्री होऊ शकेल आई होण्यासाठी अधिक काही असण्याची, करण्याची निश्चित गरज आहे. आई कधी रागावते का? सगळा दया-क्षमा-शांतीचा कारभार!. ज्यांनी प्रत्येक स्त्री मध्ये मातृत्व बघितले ते संत झाले आणि ज्या मातांनी आपल्या मुलांना प्रत्येक स्त्रीकडे बघताना, समाजाकडे बघताना, देशाकडे बघताना पुत्रभावाने बघायला शिकविले ते महापुरुष झाले. भारतातील सर्व महापुरुष महान मातृभक्त होते. जो मातृभक्त नाही तो महान होऊच शकत नाही. आज ‘मातृत्व’भावाचा अभाव असल्यानेच अनेक समस्या भीषण रूप धारण करीत आहेत. आपण खऱ्या अर्थाने ‘मातृत्व भावना’ पुनः प्रस्थापित करु शकलो तर पन्नास टक्के समस्या आपसूक संपतील.

एक संतवचन आहे, “आपल्या बायकोतील आई दिसायला लागली साधक पक्का झाला.” हा ‘भाव’ जागृत रहावा म्हणून पूर्वी स्त्रिया स्वतःची ओळख मी ‘अमक्याची आई’ अशी करुन द्यायच्या. छोट्या छोट्या गोष्टींचा मनुष्याच्या मनावर परिणाम होत असतो हे आज आधुनिक विज्ञान सुद्धा मान्य करते. आपल्या पूर्वसूरींना किती सूक्ष्म विचार केला होतां याचे हे आपल्या यावरुन लक्षात येईल. मेमरी कार्ड वरील एखादा bite खराब झाला तर अख्खे memori card corrupt होते, तसेच मनावरील तृष्णेचा एखादा छोटासा डाग देखील आयुष्याच्या नाशास कारणीभूत होऊ शकतो. शिल्प घडवताना कारागीर पुरेशी सावधनाता बाळगून काम करतो. अगदी त्याचप्रमाणे मानवी जीवनाचे शिल्प घडवताना अखंड सावधानता बाळगणे अत्यावश्यक आहे, म्हणून समर्थ म्हणतात, “अखंड सावधान असावे।” तर तुकाराम महाराज म्हणतात, “रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग।” तर श्री सद्गुरू गोंदवलेकर महाराज म्हणतात की ‘सतत नामात राहावे.’ आजच्या भाषेत सांगायचे झाले तर ‘range’ मध्ये रहा. ‘Be Connected.’

संत तुकाराम महाराजांची एक गोष्ट आहे. महाराज वारीला जाताना नेहमी आपल्या मित्राला सोबत येण्यास सांगत. तो नेहमी एक कारण सांगे की मी येणारच होतो पण मला माझ्या ओसरीवरील खांबाने धरुन ठेवले आहे. एकदा उत्सुकतेने महाराज त्याच्या घरी गेले आणि बघतात तो काय? त्यांच्या मित्रानेच त्या खांबाला धरुन ठेवले होते. महाराजांनी मित्राच्या ते लक्षात आणून दिले आणि मग तो नित्य वारीला जाऊ लागला. आपलीही अवस्था त्या मित्रासारखीच आहे. फक्त आपल्या ओसरीवरील खांब थोड्या वेगळ्या प्रकारचे आहेत आणि मुख्य म्हणजे आपल्या ओसरीवर अनेक खांब आहेत. एक खांब असमाधानाचा आहे, एक काळजीचा आहे, एक भीतीचा आहे, एक द्वेषाचा आहे, एक आळसाचा, एक कटू वचन किंवा कटू वाणीचा आहे. हे सर्व खांब आपण सोडले तर आपण ‘तुकाराम महाराजां’बरोबर आनंदाने आनंदाच्या वारीला जाऊ शकतो. वारकऱ्यांना वारीत जाऊन जो आनंद मिळतो तो आनंद आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात लाभू शकतो.  याची  सूत्र आपल्याला अध्यात्मात मिळतात. संतांनी ती सूत्रे आचरणात आणून, पडताळून बघितली आणि मग आपल्या सारख्या सामान्य मनुष्याना सांगितली.

“ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्तीं असूं द्यावे समाधान”

— संत तुकाराम महाराज

हे वरील वचन संत तुकाराम महाराज जगले. ते जगले यामागे त्यांना काही सिद्ध करायचे नव्हते, त्यांना काही कमवायचे नव्हते, त्यांना लौकिक संपत्ती नको होती, त्यांना पदप्रतिष्ठा नको होती. म्हणून आज चारशे वर्ष होऊनही त्यांचे नाव अबाधित राहिले आहे. संत तुकारामांची गाढवावरून धिंड काढली गेली, त्यांचा प्रतिसाद होता, गावकरी चांगले आहेत, त्यांनी माझे खूप मोठं कौतुक केले, नाहीतर माझी मिरवणूक कोणी काढली असती ? मला सारा गावं बघता आले, त्यांच्या गळ्यात शिराळे, घोसाळे, आदी भाज्यांच्या माळा घातल्या तेव्हा ते म्हणाले, चला! चार दिवसांची भाजी सुटली”. जन्मजात सावकारी असतानाही दुष्काळात सर्व कर्जांचे कागद त्यांनी खातेदारांना परत देऊन टाकले. कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नसताना, आंदोलने केलेली नसताना, तसा सरकारी आदेश नसताना ‘उस्फुर्त कर्जमाफी’ केली. पुढे सावकारी बुडाली आणि दिवाळे निघाले तेव्हा सुद्धा तुकाराम महाराज यांनी फक्त प्रतिसादच दिला. बायको, मुले, भाऊ जेव्हा दुष्काळाची शिकार झाली, तेव्हा ते म्हणाले,

“बरे जाले देवा निघाले दिवाळे , बरी या दुष्काळे पीडा केली ॥

अनुतापे तुझे राहिले चिंतन , जाला हा वमन संसार ॥

बरे जाले जगी पावलो अपमान , बरे गेले धन ढोरे गुरे ॥

बरे जाले नाही धरिली लोकलाज , बरा जालो तुज शरण देवा ॥

बरे जाले तुझे केले देवाईल , लेकरे बाईल उपेक्षिली ॥

तुका म्हणे बरें व्रत एकादशी , केले उपवासी जागरण ॥”

*

त्याच्याही पुढे  जाऊन ते म्हणतात,

*

“बाप मेला न कळता । नव्हती संसाराची चिंता॥

विठो तुझे  माझे  राज्य । नाही दुसऱ्याचे काज ॥

बाईल मेली मुक्त जाली । देवे  माया सोडविली ॥

विठो तुझे  माझे  राज्य । नाही दुसऱ्याचे काज ॥

पोर मेले बरे  जाले । देवे  मायाविरहित केले।

विठो तुझे  माझे  राज्य । नाही दुसऱ्याचे काज।।

माता मेली मज देखता । तुका म्हणे हरली चिंता ।।

विठो तुझे  माझे  राज्य । नाही दुसऱ्याचे काज।।”

इतके कर्तव्यनिष्ठुर होणे आपल्याला जमणार नाही, परंतु आपण प्राप्त स्थितीचा स्वीकार तरी नक्कीच करु शकतो. कारण एकच त्यांनी आपल्या वाट्याला आलेल्या प्रारब्धाचा खुल्या मनाने संपूर्ण स्वीकार केला आणि आयुष्यास समर्पक प्रतिसाद दिला. थोडा अभ्यास केला तर हा अलिखित नियम सर्व संतांनी काटेकोरपणे पाळला आहे असे आपल्या लक्षात येईल. संत ज्ञानेश्वर अर्थात माऊली,

संत मीराबाई , अगदी अलिकडील संत गाडगे महाराज, ह्या सर्वांनी आपल्या वाट्याला आलेले प्रारब्ध आनंदाने भोगून संपवले, झालेल्या हालअपेष्टा, यातना, उपेक्षा सहजपणे स्वीकारल्या. अर्थात ‘प्रतिसाद’ देऊन, कोणाही माणसावर आकस न ठेवता. माऊलींनी पसायदानात ‘खळ सांडो’ असे न म्हणता ‘खळांची व्यंकटी सांडो’ असे म्हटले हा सुद्धा प्रतिसादच!!

आयुष्याला तुमच्या तर्कशास्त्राशी वा तत्वांशी काहीही देणेघेणे नाही, ते आपापल्या पद्धतीने प्रवाही होत असते. अखेरीस तुम्हांला या जीवन प्रवाहातून प्रवाहित व्हायचे असते. म्हणून जीवनाला सर्वोत्तम प्रतिसाद द्या. कारण आयुष्य हे कधीही आपल्या तर्कशास्त्रावर चालत नाही.

बदल हा जीवनाचा सर्वश्रेष्ठ नियम आहे. गोपाळ कृष्णाच्या चरित्रात आपल्याला याचे दर्शन होते. ज्याला गर्भात असल्यापासून शत्रू मारायला टपले होते. जन्म झाल्यावर देखील लगेच स्वतःच्या आईला सोडून दुसऱ्या ठिकाणी जावे लागले, तिथे सुद्धा पुतना मावशी आलीच. आपण कृष्ण चरित्र बघतांना तो अवतार होता हा ‘समज’ मनातून काढून टाकूया. कृष्ण ‘समाजाच्या’ गरजेनुसार आणि लोकांसाठी उपयुक्त असेच जीवन जगला. वेळप्रसंगी स्वतःचे नाव खराब होईल याची त्याने तमा बाळगली नाही. आजही त्याला ‘रणछोडदास’ असे म्हटले जाते. राजपुत्र म्हणून जन्माला आलेला मुलगा एक गवळ्याच्या घरी वाढला, गुरुकुलात राहिला, अगदी सोळा सहस्त्र नारीचा पती झाला, पण प्रत्येक गोष्ट त्याने समाजाचे व्यापक हीत ध्यानात ठेऊन समाज केली. “मैं नही, तू ही” हे सूत्र श्रीकृष्णाने जीवनातील बदल आनंदाने स्वीकारत आजीवन पाळले. म्हणूनच ते ‘पुरुषोत्तम’ झाले. ह्यालाच ‘अध्यात्म’ म्हणतात. म्हणूनच श्रीकृष्ण आज प्रत्येक भारतीयाच्या मनात स्थान प्राप्त करून आहे.

अगदी अलिकडील उदा. घ्यायचे तर लोकमान्य टिळकांचे घेता येईल. मुलगा गेल्याची वार्ता कोणीतरी येऊन टिळकांना सांगितले, लोकमान्य त्यावेळी केसरीचा अग्रलेख लिहीत होते, ते सहज म्हणाले की अग्रलेख पूर्ण करुन येतो. हा धीरोदत्त पणा अध्यात्म जीवनशैलीतूनच येतो. इथे सुद्धा लोकमान्यांनी ‘प्रतिसादच’ दिला आहे आणि परिस्थितीचा आनंदाने स्वीकार केला आहे. स्वा. सावरकरांना ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झाली, तेंव्हा त्यांचे पाहिले उद्गार काय होते ? “पन्नास वर्षे ब्रिटिशांचे राज्य टिकेल ?” हा प्रतिसादच होता. सर्व क्रांतिकारक, स्वातंत्र्यसेनानी, शास्त्रज्ञ ‘अध्यात्म’च जगत आलेले आहेत.

‘प्रतिक्रिया’ ही अपरिहार्यता असू शकते पण ‘प्रतिसाद’ नेहमीच मनुष्याची खिलाडू वृत्ती दाखविणारा, उस्फुर्त आणि सकारात्मक असतो. जीवनाकडे परमेश्वराची ‘लीला’ म्हणून पाहणारा असतो. आत्मविश्वास दाखविणारा आणि जगण्याची उमेद वाढविणारा असतो.

म्हणोन आळस सोडावा ।

येत्न साक्षेपें जोडावा ।

दुश्चितपणाचा मोडावा ।

थारा बळें ।।

दा. १२.९.८।।

समर्थ रामदास

आपण दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न अनेक वेळा करुन बघितला आहे. त्यात आपण किती यशस्वी झालो हे आपल्याला चांगलें कळले आहे. त्यामुळे आपण आता स्वतःला बदलूया, कारण ‘बदल स्वीकारणे’ आणि ‘स्वतःत बदल करणे’ हे दोन्ही आव्हानात्मक आहे. आपण बदललो की त्यामानाने जग बदलतेच.

“नजरे बदली तो नजारे बदले।

नाव ने कष्ती बदली तो किनारे बदले।”

एक दगडाचा व्यापारी होता. त्याच्याकडे विविध रंगाचे , विविध दर्जाचे, विविध आकाराचे दगड विकायला होते. एक भला मोठा दगड त्याच्याकडे  बरेच दिवस पडून होता. तो दगड बरेच दिवस विकला जात नव्हता. एकदा एक कारागीर त्याच्याकडे आला. त्याला म्हणाला हा दगड मला देता का? बरेच दिवस तो पडून होता, म्हणून तो म्हणाला फुकट ने कारण त्याने माझी जागा अडवली आहे.  कारागिराने तो दगड नेला, त्यातून सुंदर शिल्प तयार केले. एकदा व्यापारी त्याच्याकडे गेला असताना त्याने शिल्प बघितले. तो सुद्धा आश्चर्य चकित झाला. त्याने कारागिराचे तोंड भरुन कौतुक केले. म्हणाला, “तुम्ही चांगले शिल्प घडवले. त्यावर तो कारागीर म्हणाला की त्या दगडात आधीपासूनच ते शिल्प होते, मी त्याच्या आजूबाजूचा अनावश्यक भाग काढून टाकला”.

आपण सुद्धा ईश्वराचे अंश आहोत, लेकरे आहोत. आपल्यातील अनावश्यक भाग आपल्याला काढून टाकता आला तर आपल्या जीवनांचे देखील सुंदर शिल्प निश्चित बनू शकेल, यात शंका नाही. फक्त अनथक प्रयत्न अत्यावश्यक आहेत. नाहीतर मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी घड्याळाला गजर लावणे आणि सकाळी गजर वाजला की सवयीने तो बंद करणे हाच बरेच लोकांचा ‘व्यायाम’ असतो, तसे व्हायला नको.

अध्यात्माच्या आजच्या कालानुरूप नवीन व्याख्या कराव्या लागणार आहेत , त्या खालीलप्रमाणे असू शकतील.

१. ‘असेल तर असो, नसेल तर नको’ म्हणजे अध्यात्म.

२. ‘हवेनको पण’ जाणे म्हणजे अध्यात्म विनातक्रार स्वीकार्यता (Unconditional acceptance) म्हणजे अध्यात्म.

३. कुटुंबाची, समाजाची,  देशाची ‘आई’ होणे म्हणजे अध्यात्म, उदा. सिंधुताई सपकाळ उर्फ माई.

४. ‘मेरी झाशी नही दुंगी’ म्हणणे आणि तशी कृती करणे म्हणजे अध्यात्म.

५. स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणे म्हणजे अध्यात्म.

६. ‘श्रवण’ केल्याप्रमाणे कृती करणे म्हणजे अध्यात्म.

७. आपल्या कलागुणांचा, उपलब्ध साधन संपत्तीचा समाजासाठी उपयोग करणे म्हणजे अध्यात्म. इ.

जीवन जगण्याची कला- अध्यात्म‘ साठी ह्या लेखाचा समारोप एका कवितेने करतो.

*

आत आपुल्या झरा झुळमुळे निळा स्वच्छंद।

जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद।।धृ।।

*

घन धारातुनी ख्याल ऐकतो रंगुनी मल्हाराचा।

बघता बघता मोरपिसारा साऱ्या संसाराचा।

मनात पाऊस बरसे उधळीत मातीचा मधुगंध ।।१।।

*

दुःखाला आधार नको का? तेही कधीतरी येते।

दोस्त होऊनी हातचं माझा आपुल्या हाती घेते।

जो जो येईल त्याचे स्वागत हात कधी न बंद ।।२।।

*

झाडाची झुलणारी फांदी कधी लावणी भासे।

साधा कोरा कागदही कधी चंद्र होऊनी हासे।

सर्वत्रच तो बघत धुंदी, डोळे ज्याचे धुंद ।।३।।

*

कधी कुणाचे आसू पुसता बोटांनी हळुवार।

हात होतसे वाद्य सुरांचे  पाझरती झंकार।

प्रेमाच्या या गाण्यासाठी प्रेमाचा हा चंद ।।४।।

*

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जीवन जगण्याची कला : अध्यात्म – भाग १ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆जीवन जगण्याची कला : अध्यात्म – भाग १ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

भारतीय संस्कृती ही खूप पुरातन आहे. बऱ्याच परदेशी प्रवाशांनी वर्णन केल्याप्रमाणे आपला देश सर्वच क्षेत्रात नुसता प्रगतीपथावर नव्हता तर प्रगतीच्या शिखरावर होता असे म्हटले तर वावगे होणार नाही. इथे सोन्याचा धूर निघायचा असे वर्णन केलेले आढळते. लोकं काठीला सोने बांधून काशियात्रेला जात असत. सर्वच क्षेत्रांत भारत सर्वोच्च स्थानावर होता. जगाच्या पाठीवर अनेक संस्कृतींचा उदयास्त झाला. यासर्व कालप्रवाहात एकमेव संस्कृती टिकून राहिली ती म्हणजे भारतीय संस्कृती !!!  चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा उगम आणि विकास इथेच झाला. या सर्व कला म्हणजे भारताने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. त्याकाळात भारताने नुसती भौतिक प्रगती केलेली नव्हती तर आध्यत्मिक क्षेत्रात सुद्धा परमोच्च स्थिती प्राप्त केली होती. मानवी जीवनाचा विकास फक्त मनुष्याच्या भौतिक गरजा भागवून होत नाही हे आपल्या ऋषीमुनींनी जाणले होते. त्यामुळे त्यांनी मनुष्याच्या भौतिक गरजांसोबत त्याच्या मनाचाही सखोल अभ्यास केला. आपल्याकडील सर्व ऋषीमुनी उत्तम मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी आपल्या संस्कृतीची जडणघडण पूर्णपणे निसर्गानुकूल (ecofriendly) आणि मानवी मनाच्या विविध कंगोऱ्यांचा अभ्यास करुन केली. भौतिकसुबत्ता किंवा अमर्याद भौतिकसुख हे काही मानवी जीवनाचे अंतिम साध्य असू शकत नाही हे त्यांनी त्या पद्धतीने जगून समजून घेतले. नुसत्या अमर्याद भौतिक गरजा पूर्ण करण्याच्या स्पर्धेमुळें अमेरिकेची अवस्था काय झाली आहे आपल्याला ज्ञात आहे. जोपर्यंत मनुष्याचे मन शांत होत नाही तोपर्यंत तो कधीच खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकत नाही, हे आपल्या पूर्वजांनी जाणले. आणि जसा रोग तसे औषध या उक्तीनुसार त्यावर उपाय शोधला. उपाय शोधणे कोणीही करु शकेल पण मानवी जीवनाचा अभ्यास करुन त्याप्रमाणे आदर्श जीवनचर्या आखणे आणि तो समाजातील सामान्य मनुष्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग होणे हे लिहायला, ऐकायला सामान्य वाटले तरी हे जनमानसात रुजविणे फार अवघड होते. पण आपल्या पूर्वजांनी तेही करून दाखविले. तसेच संवर्धितही केले. थोडक्यात दैनंदिन जीवन जगताना मनःशांती मिळवायची असते हे त्यांनी विसरायला लावले आणि अशी जीवनपद्धती विकसित केली की त्या पद्धतीने मनुष्याची आपसूक मनशक्ती वाढून मन:शांतीचा नकळत लाभ होईल. याविशिष्ट जीवनपद्धतीला त्यांनी ‘अध्यात्म’ असे नाव दिले.

अध्यात्म ही खरं तर भारतीय जीवनपद्धती (आचारपद्धती) आहे, जीवनकला आहे. हजारो वर्षांची राजकीय गुलामगिरी जरी संपली असली तर सांस्कृतिक गुलामगिरीचा पघडा जनमानसावर अजून आहे असे ठळकपणे जाणवते. सध्याची आपली जीवनपद्धती ना धड भारतीय आहे ना पूर्णपणे विदेशी. सरमिसळ झालेल्या संस्कृतीत आपण सर्व अजब पद्धतीने आपले जीवन जगत आहोत. आपले सोडायला मन धजावत नाही आणि पाश्चात्यांचे पूर्ण स्वीकारता येत नाही. अशी द्विधा मनःस्थिती आपली सर्वांची कमीअधिक प्रमाणात आहे. प्रत्येकाला जीवनात आनंद हवा आहे, पण आज माझ्या जवळ आनंद आहे किंवा मी आनंदी आहे असे स्वतःहून, मनःपूर्वक  छातीठोकपणे म्हणणारा मनुष्य शोधावा लागेल अशी परिस्थिती आहे. यावर एकच उपाय आहे तो म्हणजे आपल्या जीवन पद्धतीची पुनर्रचना करणे. यात आपल्याला कोणतेही कर्म बदलायचे नसून फक्त दृष्टिकोन बदलायचा आहे. कोणत्याही नवीन तंत्रज्ञानाची इथे गरज नाही. दृढनिश्चय मात्र नक्कीच हवा. पूर्वी लोक असेच जगत होते, त्यामुळे त्यांच्या जीवनात ‘आनंद’ होता.

आज मात्र प्रत्येक जण आनंदाच्या शोधात आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मनुष्याचा ‘आनंदा’चा शोध सुरु आहे. मनुष्य सकाळी झोपेतून जागे झाल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक गोष्टी करीत असतो. त्यातील बऱ्याचशा गोष्टीत तो कमीअधिक प्रमाणात यशस्वी देखील होतो तर काही गोष्टीत तो अपयशी ठरतो. दिवसभरात त्याच्या आयुष्यात सुखदुःखाचे, जयपराजयाचे अनेक प्रसंग येतात, त्याला मानापमान सहन करावा लागतो.

दिवसभरातील प्रेम, माया , मोह,  जिव्हाळा, आपुलकी, तिरस्कार, हेवा, मत्सर, राग, द्वेष अशा विविध भावभावनांच्या हिंदोळ्यावर आपले मन सावरण्याचा मनुष्य आटोकाट प्रयत्न करीत असतो. भावनांच्या हिंदोळ्यावर मन स्थिर ठेवणे हे अतिशय कौशल्याचे काम नसले तरच नवल !!!

कोणतीही गोष्ट कुशलतेने करायची असेल तर ते कौशल्य आत्मसात करणे क्रमप्राप्त ठरते. काही माणसे जगायचे म्हणून जगत असतात. काही मरत नाहीत म्हणून जगत असतात. काही माणसे दुसऱ्यासाठीच जगत असतात. तर मोजकी माणसे काही विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन फक्त त्या विशिष्ट उद्दिष्टासाठी जगत असतात. सर्वांचे ‘जगणं’ हे एकच असले तरी प्रत्येकाच्या जगण्याचे मूल्य मात्र भिन्न भिन्न असते आणि असे होणे स्वाभाविक आहे. स्वाभाविक त्यांच्या जीवनाची यशस्वीताही वेगवेगळी असते. दुसऱ्याला त्रास देण्यासाठी जगणे याला आपल्याकडे ‘विकृती’ असे म्हणतात. स्वतःसाठी जगणे याला ‘प्रकृती’ असे म्हणतात तर दुसऱ्यासाठी जीवन जगणे याला ‘संस्कृती’ असे म्हणतात. सर्व संतांनी मानवी मनाचा जितका अभ्यास केला तितका अभ्यास खचितच दुसरा कोणी केला असेल. आत्म्याने गर्भवास पत्करल्यापासून गर्भावासाचा त्याग करेपर्यंत त्या आत्म्यास त्याच्या ‘स्व’स्वरूपाचे ज्ञान असते. पण एकदा का त्याने या नश्वरजगात प्रवेश केला (मनुष्याचा जन्म झाला) की मनुष्य देवाला तू कोण आहेस असा प्रश्न विचारु लागतो. ‘सोहं’ म्हणणारा आत्मा ‘कोहं’ असे म्हणू लागतो. संत असे सांगतात की देहबुद्धीमुळे मनुष्य आपल्या ‘स्व’स्वरूपाला विसरतो आणि देहदु:खात बुडून जातो. देहबुद्धीमुळेच त्याला सुख दुःख आणि आनंद यातील सूक्ष्म फरक लक्षात येत नाही आणि मग ज्याच्यात्याच्या सुखदुःखाच्या (मिथ्या) कल्पनेप्रमाणे  मनुष्य आयुष्यभर नुसता भरकटत राहतो. बरेच वेळेस ह्या भरकटण्यालाच सामान्य मनुष्य सुख समजतो आणि सुज्ञ लोकं त्यास ‘भ्रम’ असे संबोधतात.

देहसोडून जाईपर्यंत अर्थात मृत्यूपर्यंत मनुष्य सुखच शोधीत असतो. पण खरंच त्याला सुख मिळतं ? त्याला समाधानाचा लाभ होतो ? आज आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या मित्रांपैकी एखादा मित्र मैत्रीण सुखी आहे, समाधानी आहे असे आपल्याला जाणवतं का ? मित्रांचे सोडून देऊया, पण एकांतात बसल्यावर आपण सुखी आहोत, समाधानी आहोत असे आपल्याला क्षणभर तरी वाटते ? या प्रश्नाचे खरे उत्तर ‘नाही’ असेच द्यावे लागेल, हो न? खरंतर आपले सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन केले पाहिजे. आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर मला मोठे प्रश्नचिन्ह दिसत आहे की हा माणूस काहीही घडलेले नसताना आमचे का अभिनंदन करीत आहे. आपली शंका रास्त आहे. कारण समोरील मनुष्याचे कौतुक करण्याची संधी आपल्याला अनेक वेळेस अगदी विनासायास उपलब्ध होत असते, परंतु  आपण आपल्याच सुखदुःखात इतके गुरफटून घेत असतो की ते आपल्या लक्षात येतच नाही. आता मूळ मुद्यावर येतो. आपले कौतुक करायला हवे कारण आपण मनातल्या मनात तरी कबूल केले आहे की आपण एखादवेळेस दुःखी नसू पण सुखी आहोत असेही नाही. आपण आता एक गृहपाठ  करुया. गृहपाठ म्हणण्यापेक्षा आपण त्याला मनोपाठ असे म्हणूया. कारण आपल्याला तो आताच म्हणजे लगेच आणि आपल्या मनातल्या मनातच करायचा आहे. आपण सुखी का नाही ? आपल्याला समाधान का मिळाले नाही याची काही उत्तरे शोधण्याचा आपण प्रयत्न करुया. मी अवघड प्रश्न विचारत नसल्यामुळे कोणालाही आपले उत्तर प्रगट करावे लागणार नाही. असो. तर आता आपण आपले उत्तर मनात शोधले असाल. आपण शोधलेली सर्व उत्तरे अगदी बरोबरच आहेत. त्यामुळे आपल्याला शंभर पैकी शंभर गुण मिळालेले आहेत. आपण सर्व विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेले आहात. तरीही एक प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर देऊनही आपण समाधानी का  नाही? आपण आनंदी का नाही? आपण सुखी का नाही? आपण जगतोय की जगवले जातोय ? की नाईलाजाने दिवस ढकलतोय ? हे जीवन आपल्यासाठी नक्की काय आहे? जीवनाचा खरा अर्थ काय ? असे अनेक प्रश्न आपल्याला याआधी पडले असतील ? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला अध्यात्मात मिळू शकतात.

हा जगातला सर्वात चांगला शब्द म्हणजे आनंद. कारण आनंद सर्वांना हवा आहे. मुख्य म्हणजे आनंद या शब्दाला विरुद्धार्थी शब्दच नाही. सामान्य मनुष्य यामध्ये सुद्धा थोडी गफलत करतो. तो सुख आणि आनंद यांची बरेचवेळेस सरभेसळ करतो. सुखदुःख हे कशावरतरी अवलंबून असू शकते किंवा अवलंबून असतेच. पण आनंद हा पूर्णपणे स्वतंत्र आहे. याच्यावर कोणाचे बंधन नाही. खरंतर आनंद आपल्या हातात असायला हवा. माझा आनंद माझ्या हातात! सुखदुःख स्थितीरुप आहे तर आनंद वृत्तीरूप आहे. मनुष्याला कुठेही कधीही कसाही, अगदी जिथे आहे तिथे, आनंद मिळू शकतो. गंमत अशी आहे की आनंद मिळण्यासाठी सर्वात मोठी आणि एकमेव आडकाठी आपली स्वतःचीच असते. कारण ‘आज रोख उद्या उधार’ या धर्तीवर आपण आनंद सुद्धा ‘उद्यावर’ टाकत असतो. अमुक गोष्ट झाली की मला आनंद मिळेल, नोकरी मिळाली की आनंद मिळेल, नोकरीत बढती मिळाली की आनंद मिळेल, अमका मनुष्य भेटला की आनंद मिळेल, अमुक व्यक्ती आयुष्याची जोडीदार म्हणून लाभली तर आनंद मिळेल, असे कितीक ‘तर’ आपण आपल्या आनंदाच्यामागे जोडतो आणि आपला आनंद उधारीवर ठेवतो, एका अर्थाने जगणंच उद्यावर टाकतो. बाहेरील जगात आनंद आहे असे समजून मनुष्य आनंद बाहेर शोधत राहतो. चुकीच्या जागी एखादी गोष्ट शोधली तर ती आपल्याला कशी मिळणार ? त्यामुळे आपण सतत रडगाणं गात असतो. वर्तमानकाळ ही आपल्याला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. रोज २४ तासांमध्ये स्वतःसाठी किमान एक तरी गोष्ट करायला हवी. उदा. आरशातला निवांत क्षण स्वतःला द्या, स्नानाच्या, जेवणाच्या वेळेचा आनंद लुटा. स्वतः गाणं म्हणा.  मग आज आत्ता ताबडतोब अगदी याक्षणी उपलब्ध काय असेल तर तो फक्त आनंद !!  आयुष्यातील प्रत्येक क्षण जगण्याचा प्रयत्न करुया. प्रत्येक क्षणाचा सन्मान राखत त्याचे पावित्र्य जपणे, हीच जीवन जगण्याची कला आहे. सामान्यपणे आपण दुसऱ्यांवर हक्क गाजवायचा प्रयत्नात असतो, खरंतर आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणावर राज्य करायला पाहिजे. क्षणावर राज्य करणे म्हणजे तारतम्याने विवेकाने प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया न देता ‘प्रतिसाद’ देणे. आजपर्यंत जी लोकं यशस्वी झाली आहेत त्यांनी कधीही आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणांना प्रतिक्रिया दिलेली नाही तर विवेकाने ‘प्रतिसाद’ दिला आहे.

यशापयश हे सुद्धा सुखदुःखासारखे सापेक्ष आहे. अमुक मार्क मिळविले, अमुक महाविद्यालयात प्रवेश मिळाला, नामांकित कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळाली, परदेशात जाता आले, मोठ घर बांधता आले, महागडे वाहन विकत घेता आले किंवा एखादे स्वप्न सत्यात आणता आले तर आपण यशस्वी झालो आणि यामधील मोजक्याच गोष्टी करता आल्या किंवा यातील काहीच जमलं नाही तर मी अपयशी झालो. ही दोन्हीही वाक्ये अर्धसत्य आहेत.  जोपर्यंत आपण हिंमत हरलेलो नाही तोपर्यंत आपण अपयशी असूच शकत नाही. जीवनातील यश हे नेहमी कोणते शिखर पार केले यापेक्षा ते पार करताना किती अडथळे आले यावर ठरत असते आणि ठरायलाही हवे. एखादं वेळेस लौकिक दृष्ट्या मनुष्याला अपयश येऊ शकते. पण या सर्व घडामोडीत, धबडग्यात ‘मनुष्य’ म्हणून आपले मूल्य वाढविणे हे सुद्धा यशस्वी होणेच होय. एका वाक्यात यश म्हणजे काय सांगायचे असेल तर खालील प्रमाणे सांगता येईल. “मरावे परी कीर्ती रूपे उरावे।” तसेच यशाची आणिक एक सोपी व्याख्या आहे. ‘आपल्याला लौकीक जीवनात किती यश मिळालं यापेक्षा आपल्याला दुसऱ्यांना यश मिळविण्यासाठी किती मदत करता आली’.

समाधान नावाची कोणतीही वस्तू बाजारात मिळत नाही. ज्याला स्वतःला नक्की काय हवे आहे हे योग्य वेळी कळते, तो ते मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो, कधीकधी तो गोष्ट मिळतेच असे नाही. पण तरीही आपण पुरेसे कष्ट घेतले, योग्य ते प्रयत्न केले असे समजून ही माणसे नवीन जोमाने परत कार्यरत होताना दिसतात. यश मिळालं नाही तर रडत न बसता केलेल्या प्रयत्नातून अमुक एक गोष्ट शिकता आली याचेही त्यांना समाधान असते. कोणतेही काम उरकण्यापेक्षा त्यांचे कामाच्या परिपुर्णतेकडे जास्त लक्ष असते.

“मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण।”

किंवा

“रण जिंकून नाही जिंकता येत ‘मन’।

‘मन’ जिंकल्याशिवाय नाही जिंकता येत रण।।”

आधुनिक विज्ञान असे सांगते की जी गोष्ट जितकी सूक्ष्म असते ती अधिक शक्तिशाली आणि नियंत्रित करण्यासाठी जिकिरीची असते. अणुबाँब किंवा अणुशक्ती ही याची उत्तम उदाहरणे आहेत. मानवी मन यापेक्षा सूक्ष्म असते. अणू प्रयोगशाळेत तरी दाखवता येईल पण मनाचा थांगपत्ता लागणे अतीमुश्किल !!

म्हणून कोणतेही संत असोत, त्यांनी सर्वप्रथम उपदेश आपल्या मनाला केला असावा. नुसता उपदेश केला नाही तर मनाला प्रसन्न करुन घेण्याचे विविध मार्ग त्यांनी आपल्यासाठी सहज उपलब्ध  करुन दिले आहेत.  मुळात मन प्रसन्न का करायचे ? याचा आधी विचार करायला हवा. मला जीवनाकडून नक्की काय हवे आहे? मनुष्य म्हणून माझा जन्म झाला असेल तर मनुष्य म्हणून माझे काही विहित कर्तव्य असलेच पाहिजे. जगात कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही असे विज्ञान सांगते, तर माझा जन्म झाला याला काहीतरी प्रयोजन नक्कीच असणार.? मनुष्य म्हणून आपण सर्व सारखे असलो तरी आपण एकाच कारखान्यात उत्पादीत केलेले एकाच वजनाचे, एकाच सुगंधाचे ‘साबण’ नाही. त्यामुळे प्रत्येकाचे जीवनध्येय वेगवेगळे असणे स्वाभाविक आहे. ते जीवनध्येय शोधणे आणि त्यानुसार आचरण करणे हे मनुष्याचे आद्यकर्तव्य असले पाहिजे. पण मनुष्य देहबुद्धीच्या अधीन जाऊन ‘आहार, निद्रा,भय आणि मैथुन’ यालाच आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता मानतो आणि

“पुनरपि जननं पुनरपि मरणं, पुनरपि जननी जठरे शयनं” याच चक्रात फिरत राहतो.

आतापर्यंत आपण सामान्य मनुष्य कसा वागतो, त्याचे दुष्परिणाम काय होतात, त्यामुळे मनुष्याचे कसे नुकसान होते हे आपण पाहिले. प्रत्येकाला आनंद / समाधान हवे आहे पण ते का मिळत नाही हे सुद्धा आपण पाहिले. आता तो कसा मिळवायचा ते आपण पाहूया.

सर्वप्रथम आपले एकमत आहे ना की आपल्याला आपल्या जीवनात आनंद हवा आहे. सर्वाना मान्य असेल तर आपण पुढे जाऊ. धन्यवाद.

क्रमशः…

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हे जीवन सुंदर आहे…! ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

हे जीवन सुंदर आहे…! ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆

जीवन इतके सुंदर आहे, अनुभव तुम्हास येत जाईल,

प्रयत्न करायला विसरू नका, मार्ग तुम्हाला सापडत जाईल.

जीवन ही एक रंगभूमी आहे आणि आपण त्यातील एक पात्र आहोत, जीवन म्हणजे दोन घडीचा डाव, जीवन हा एक संघर्ष आहे. जीवनाच्या अशा अनेक व्याख्या थोर पुरुषांनी केल्या आहेत. आपले जीवन हा एक अनुभवप्रवाह आहे. प्रत्येक व्यक्तीचे जीवनाविषयीचे मत हे त्याला स्वत:ला येणार्‍या बऱ्यावाईट अनुभवांवर अवलंबून असते. प्रत्येकाच्या जीवनात चढउतार असतातच…., नाही का? जीवन हा एक ऊन-सावलीचा खेळ असतो. सतत सुख किंवा सतत दु:ख असे क्वचितच आढळते.  जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कोणी मागे तर कोणी पुढे अशी स्थिती आढळते. आपण गतिमान असावे व प्रगतिपथावर राहावे. ही प्रक्रिया सुरू होण्यात व चालू राहण्यात जीवनाचे सार्थक आहे.

एवढ्याशा आयुष्यात मनुष्याला खूप काही हवं असतं…

आणि नेमकं हवं असतं तेच मिळत नसतं…

हवं ते मिळून सुद्धा खूप काही मिळालेलं नसतं…

चांदण्यांनी भरुन सुध्दा आभाळ त्याचं रिकामं असतं…

जीवन आनंदाने जगण्यासाठी अत्यावश्यक काय आहे असे कोणालाही विचारले तर जवळजवळ सर्वजण एकच उत्तर देतील तो म्हणजे पैसा आणि तो मुबलक असावा. तुमच्या मनातलं बोललो न मी ? अहो, स्वाभाविक आहे, मी ही तुमच्यातीलच एक आहे….!

श्रीसद्गुरु ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे एक वचन आहे, की मनुष्याला मिळणारा पैसा हा कष्टाने मिळत नाही तर प्रारब्धाने मिळतो. त्यामुळे मला इतकाच पैसा का मिळाला हा प्रश्न उचित नाही आणि किती पैसा मिळाला की मनुष्याचे समाधान होईल याचेही उत्तर कोणी अचूकपणे देऊ शकत नाही, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले तर मनुष्य अधिक सुखी होईल असे वाटते.

सध्याची परिस्थिती लक्षात घेता, सध्याचा काळ थोडा परीक्षा घेणारा आहे, हे नक्की. आपण कधीतरी विद्यार्थीदशेतून नक्कीच गेले असू. परीक्षेला घाबरणारा विद्यार्थी नापास न होईल तर नवल .. मनुष्य अनेकवेळा जितका वाईट घटना घडल्याने घाबरत नाही, तितका वाईट घटना घडेल या भीतीने घाबरतो. अनेकांना भीतीचीच भीती जास्त वाटत असते. यातून बाहेर पडण्याचा सोपा मार्ग म्हणजे काळजी करायची नाही, काळजी  घ्यायची. चिंता सोडायची.

मी जिंकणार आणि मी नक्कीच जिंकणार !! असे किमान एकदा सकाळी जागे झाल्यावर आणि रात्री झोपताना मनाला सांगायचे.

गंमत बघा, आपल्याला जे काही संत माहीत असतील, ज्या संतांची चरित्रे आपण वाचली असतील, काहींनी अभ्यासलीही असतील, त्यापैकी कितीजण गडगंज श्रीमंत होते, गडगंज सोडून देऊ, किती जण नुसते श्रीमंत होते..? उत्तर आपल्या ओठावर आहे, ते तसेच राहू द्या. मला एक सांगा, कोणत्या साधुसंतांचा टिंगल झाली नाही ? कोणत्या संताला हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या नाहीत..?, कोणत्या संताची लोकांनी निंदा केली नाही…? अहो अनेक संतांनी जे सोसलं त्यापैकी एक टक्काही आपण उण्यापुऱ्या आयुष्यात सोसलं नसेल…..? आठवून पहा. बरं इतके सहन करूनही ज्यांनी टीका केली, निंदा केली, ज्यांनी विषप्रयोग केला, त्यांच्याविरुद्ध एकाही संताने तक्रार केल्याचे ऐकिवात नाही. उलट या सर्वांवर सर्व संतांनी कृपाच केल्याचे आपल्या लक्षात येईल. माउलींनी पसायदान मागितले, श्री सद्गुरु गोंदवलेकर त्यांच्यावर विषप्रयोग होणार हे माहीत असूनही विष प्रयोग करणाऱ्याचे मन मोडू नये म्हणून त्याच्या घरी जेवावयास गेले.

सध्याचा काळ संक्रमणाचा आहे. आगगाडी किंवा  विद्युतरथ जेव्हा रूळ बदलतो, तेव्हा जास्त खडखडाट होतो. आपण थोडे तटस्थ राहून विचार करायचा. शांतपणे विचार केला तर नक्कीच काहीतरी मार्ग मिळू शकेल.

खालील विचार आज आपल्याला उपयुक्त आहेत असे वाटते, म्हणून इथे देत आहे.

१. आपल्या आयुष्यात जे काही घडतं ते नक्कीच महत्वाचे असते पण त्यापेक्षा आपण त्यास कसे सामोरे जातो किंवा कसा ‘प्रतिसाद’ देतो हे अधिक महत्वाचे असते.

२. मी चांगला नाही, मी यशस्वी होऊ शकत नाही, माझ्या नशिबातच नाही ह्या आपल्या मनातील सर्वात घातक कल्पना आहेत, त्या समूळ नष्ट करुया.

३. मी चांगला आहे, मी ते करु शकतो आणि मी नक्की जिंकेन या शक्तीदायी कल्पना आपण मनात रुजवू.

४. सकारात्मक विचार करण्याची,  सकारात्मक बोलण्याची, सकारात्मक कृती करण्याची सवय लावून घेऊया.

५. कोणतीही गोष्ट किमान दोनदा घडते. एकदा कल्पनेत आणि दुसऱ्यांदा प्रत्यक्षात. म्हणून आपल्याला हव्या असलेल्या सकारात्मक कल्पना करुया म्हणजे अगदी तशाच घटना प्रत्यक्षात घडतील.

६. आपण स्वतःला काय समजतो हे फार महत्वाचे आहे. त्यामुळे स्वतःवर प्रेम करा. स्वतःच्या क्षमता ओळखून प्रेम करा. स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करुया. ज्याप्रमाणात आपण बदलू त्याप्रमाणात जग बदलतेच.

७. ‘दृष्टिकोन’ बदलू.

८. मनाचे व्यवस्थापन करायला शिकणे हे सुखी होण्याचे मूलभूत सूत्र आहे.

९. ‘मन’ हेच सर्व सुखदुःखाचे ‘मूळ’, ‘खोड’ ‘पान’, ‘फुल’ आणि ‘फळ’ आहे.

१०. ‘निरामय’ जीवनासाठी नुसता शारीरिक व्यायाम पूरेसा नाही तर मनाच्या व्यायामाचीही तितकीच गरज आहे.

११.  इथून जाताना आपण काय घेऊन जाणार आहोत हे जर मनुष्याला नक्की करता आले तर मनुष्याचे अनेक व्याप आपसूक कमी होतील.

१२. मनामध्ये समुद्रासारखी ‘स्वीकार्यता’ आणि वागण्यात तशीच ‘मर्यादा’ असावी.

१३. प्रत्येक गोष्टीला अंत आहे, हेच अंतिम सत्य आहे. आपण ते स्वीकारले पाहिजे.

१४. ‘स्मरणात देखील ‘मरण’ आहे आणि हेच खरे ‘मरण’, बाकी सर्व मृत्यू.

१५. मनाची विशालता आकाशासारखी असावी.

१६. जे मनुष्याकडे असते, मनुष्य त्यातीलच थोडेफार इतरांना देऊ शकतो. उदा. ज्याच्याकडे आनंद तो आनंद देतो, ज्याच्याकडे सुख आहे तो सुख आणि  ज्याच्याकडे दुःख ….

१७. ‘शेषशायी’ असूनही भगवंत स्मितहास्य करु शकतात कारण ते कायम ‘सम’ स्थितीत असतात.

१८.कायम ‘सम’ स्थितीत राहणे ही सुद्धा एक साधना आहे.

१९. मला ‘कोणी’तरी पहातो आहे हे कायम ध्यानात ठेवावे, म्हणजे आपल्या हातून कधीही वावगे होणार नाही.

२०. ‘परि’स्थिती कशीही असो, आपली ‘आत्म’स्थिती (आनंदाची स्थिती) कायम राहावी आणि त्यासाठी उत्तम उपाय म्हणजे नामस्मरण!!!

२१. मैं’ नही । ‘तू’ ही।

                           श्री गोळवलकर गुरुजी.

२२. “पहावे आपणासी आपण। या नाव ज्ञान।।”

                                 समर्थ रामदास

२३. आपण आनंदाने आनंदाला बोलवूया, आनंद आनंदाने आपल्या घरी येईल, आनंद आनंदाने आपल्याकडे राहील, आनंद आनंदाने आपल्या घरी आल्यामुळे आपले घर आनंदाने भरून जाईल, मग सर्व ठिकाणी आनंदी आनंद असेल!!!*

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग १० ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १० ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- आयुष्यात कोणतेही प्रसंग कोणत्याही घटना कधीच विनाकारण घडत नसतात. त्याला कांही एक कार्यकारणभाव असतोच.माझी बहिण आणि मेव्हणे दोघांनीही मला एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमधे नाव नोंदवायला प्रवृत्त करणंही याला अपवाद नव्हतं याचा थक्क करणारा प्रत्यय मला लवकरच येणार होता!)

खरंतर अशा विशिष्ट कार्यकारणभाव असणाऱ्या पण त्या त्या क्षणी चकवा देत अकल्पितपणे घडत रहाणाऱ्या प्रसंगांनीच आयुष्य आकाराला येत असतं.ते सगळे क्षण आपण नेमके कसे स्विकारतो यावरच आपलं हेलपाटणं किंवा सावरणं अवलंबून असतं.मी त्याक्षणी आयुष्यात अशा वळणावर उभा होतो,की एखादीही नकारात्मक घटना स्विकारण्याची माझी मानसिक तयारीच नव्हती.पण अगदी कोणत्याही क्षणी घडू शकतील असे माझ्या ‘त्या’च्यावरील श्रद्धेची कसोटी पहाणारे अनेक प्रसंग मात्र वाटेत दबा धरुन बसलेले होतेच.मला ते ज्ञात नसल्यामुळेच केवळ मी अज्ञानातल्या सुखात निश्चिंत होतो!

दुसऱ्या दिवशी बहीण आणि मेव्हण्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी दोन दिवस उन्हात हेलपाटे घालून मुंबईतल्या एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमधे नाव नोंदवलं. फॉर्म भरताना पत्रव्यवहाराचा पत्ता अर्थातच बहिणीचा दादरचाच दिला होता.

मुंबईतल्या कडक उन्हात मी दोन दिवस घातलेल्या त्या हेलपाट्यांमुळे किंवा मुंबईतल्या बदललेल्या हवापाण्यामुळेही असेल मला अचानक खूप ताप भरला. सलग तीन दिवस डाॅक्टरांचं औषध घेतल्यानंतर तो हळूहळू उतरला तरी अशक्तपणा जाणवत होताच.मन तर मरगळूनच गेलं होतं. अगदी बहिण झाली तरी तिच्यावर असं ओझं बनून पडून रहाणं मला नको वाटतं होतं.एखादा चमत्कार घडावा तसा मनात भरुन राहिलेला तो अंधार अचानक नाहीसा होऊन लख्ख प्रकाश जाणवला तो माझ्या मोठ्या भावाकडून आलेल्या अनपेक्षित टेलिग्राममुळे!

इस्लामपूरला भावाच्या बि-हाडी स्टेटबॅंकेने पाठवलेलं माझं अपाॅईंटमेंट लेटर येऊन पडलं होतं.त्यानुसार जाॅईन व्हायला पंधरा दिवसांची मुदत होती.भावाने तत्परतेने ते काॅललेटर रजिस्टर पोस्टाने दादरच्या पत्त्यावर पाठवून दिल्याची ती तार होती!

माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही.नकारात्मक विचारांनी मलूल झालेलं मन एकदम उल्हसित झालं.पिसासारखं हलकं होऊन हवेत तरंगू लागलं.मनाच्या उभारीमुळे अंगातला अशक्तपणा कुठल्याकुठे पळून गेला.

मी मुंबईला यायला निघाल्यापासूनच्या काळात घडलेली ही पहिलीच सुखद घटना न् तीही अशी अनपेक्षित. त्यामुळे ती मनाला उभारी देत होती आणि मला पूर्णत: निश्चिंतता!

भावाने पाठवलेलं रजिस्टर मिळालं त्याच्या दुसऱ्या दिवशीच त्यातलं काॅल लेटर घेऊन मी स्टेट-बँकेच्या स्टाफ डिपार्टमेंटमधे जाऊन भेटलो तो ‘गुरुवार’ होता!हा योगायोग मला दिलासा देत मनावरचं अनामिक दडपण थोडं दूर करणाराच होता.बॅंकेच्या मेडिकल आॅफीसरना ऍड्रेस केलेलं माझ्या मेडिकल टेस्टसाठीचं पत्र आणि स्टेट बॅंकेच्या वरळी ब्रॅंचला जॉईन होण्यासाठीचं कॉल लेटर तयार होईपर्यंत मला बसायला सांगण्यात आलं.ती दहाएक मिनिटं मी खूप रिलॅक्स होतो. आई-बाबा,भाऊ सगळ्यांची अतिशय तिव्रतेने आठवण झाली.  आणि त्यांना हे सगळं सांगण्यासाठी मी आतूर होऊन गेलो.मोबाईल खूप दूरची गोष्ट,तेव्हा घरोघरी टेलिफोनही नसायचे.पत्र हे एकच संपर्काचं साधन. त्यामुळे घरच्या आठवणींसोबत उलटसुलट विचार मनात गर्दी करीत होते.भावाचा विचार मनात आला आणि आठवण झाली ती त्याने पूर्वी याच विषयीच्या गप्पांच्या ओघात मला सांगून ठेवलेल्या एका गोष्टीची. ती आठवताच मी क्षणभर साशंक झालो. इथले मेडिकल ऑफिसर कुणी ख्रिश्चन डॉक्टर होते. ते अतिशय स्ट्रीक्टच नव्हे फक्त तर खडूसच होते म्हणे. त्यांना व्यवस्थित फेस करणं महत्त्वाचं होतं. मी याच सगळ्या विचारात दंग असतानाच माझ्या हातात माझ्या मेडिकल टेस्टसाठीचं आणि माझं पोस्टींगचं अशी दोन्ही पत्रे देण्यात आली. मेडिकल टेस्टचं पत्र पाहिलं आणि मला आश्चर्यचा धक्काच बसला. पत्र त्या कुणा ख्रिश्चन मेडिकल आॅफीसरच्या नावे नव्हतं तर चक्क ‘डॉ.आनंद लिमये’ यांना ऍड्रेस केलेलं होतं! नेहमीचे ते खडूस मेडिकल-ऑफिसर रजेवर होते म्हणे.म्हणून त्यांच्या जागी  पॅनलवर नाव असणारे हे  डॉ.आनंद लिमये त्यांचा तात्पुरता कार्यभार सांभाळत होते!मला माझ्या मेडिकल टेस्टसाठी त्यांच्याच क्लिनिकमधे जायचं होतं.माझ्या मोठ्या भावाचं नावही आनंद लिमयेच. मनाला थक्क करणारा हा योगायोग निदान त्याक्षणी तरी मला एक शुभसंकेतच वाटला होता! मेडिकल टेस्टचं दडपण क्षणार्धात विरूनच गेलं.आता यापुढं आयुष्यात हवं ते मिळवण्यापासून मला कुणीही रोखू शकत नाही ही कल्पनाच अतिशय सुखकारक होती.मी लगेचच डॉ.आनंद लिमये यांना भेटलो.तो शुक्रवार होता.मेडिकल टेस्ट फॉरमॅलिटीज् पूर्ण होऊन मी संध्याकाळी उशिरा घरी परत आलो.माझं पोस्टींग वरळी ब्रॅंचला झालेलं असल्याने मेडिकल रिपोर्ट ते दुसऱ्या दिवशी  परस्पर वरळी ब्रँचलाच पाठवणार होते जिथे मला सोमवारी जॉईन व्हायचं होतं !

दुसऱ्या दिवशीचा रविवार हा माझ्या आयुष्यातला आरामाचा अखेरचा दिवस ही कल्पनाच उत्साहाला उधाण आणणारी होती.त्यानंतर माझं अतिशय धावपळीचं, जबाबदारीचं नवं आयुष्य सुरु होणार होतं!मुंबईला येण्यासाठी घर सोडतानाची अस्वस्थता आणि अनिश्चितता यांचा लवलेशही आता मनात नव्हता.सगळा संघर्ष संपला होता आणि मी जणूकाही प्रशस्त

प्रकाशवाटेच्या उंबरठ्यावर उभा!तो उंबरठा ओलांडून त्या वाटेवर पहिलं पाऊल टाकणंच काय ते बाकी होतं!आता घरची जबाबदारी मी उचलू शकणार होतो.मोठ्या भावाच्या डोईवरचं ओझं मला हलकं करता येणार होतं.सर्वार्थानं  सर्वानाच दिलासा देणारं हे अनोखं वळण माझ्यासाठी ‘त्या’नं मला दिलेलं वरदानच होतं जसं कांही. आयुष्य इतकं सरळ सोपं असू शकतं याचा असा आनंददायी  अनुभव मी आयुष्यात प्रथमच घेत होतो. मनात होता फक्त आनंद,उत्साह आणि नवं कार्यक्षेत्र,तिथली माणसं,कार्यपध्दती,नवा अनुभव या सगळ्याबद्दलची आतूर उत्सुकता..! पण…? पण हे सगळं माझ्यासाठी अळवावरचं पाणीच ठरणार आहे अशी पुसटशी शंकाही तेव्हा माझ्या मनात आलेली नव्हती!आयुष्य इतकं सरळ सोपं नसतं याचा धक्कादायक प्रत्यय माझ्यावर आघात करायला टपून बसला होता हे हातून सगळं निसटून गेल्यानंतरच मला समजणार होतं.अगदी होत्याचं नव्हतं झाल्यानंतर!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार-विश्व – आद्य पत्रकार देवर्षि नारद ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार-विश्व – आद्य पत्रकार देवर्षि नारद ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

॥ श्री गणेशायनमः ॥

नारद उवाच –

प्रणम्यं शिरसा देव गौरीपुत्रं विनायकम।

भक्तावासं: स्मरै:नित्यंमायु:कामार्थसिद्धये ॥1॥

प्रथमं वक्रतुंडंच एकदंतं द्वितीयकम ।

तृतीयं कृष्णंपिङा्क्षं गजवक्त्रं चतुर्थकम ॥2॥

लम्बोदरं पंचमंच षष्ठं विकटमेवच ।

सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्ण तथाष्टकम् ॥3॥

नवमं भालचन्द्रंच दशमंतु विनायकम ।

एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम ॥4॥ 

*

इति श्रीमतनारदपुराणे संकष्टनाशनं गणेशस्तोत्रं सम्पूर्णम्‌ ॥

लहानपणी रोज संध्याकाळी  प्रार्थना, श्लोक आणि पाढे म्हणताना सर्व प्रथम गणपती स्तोत्र म्हणायचो. मग मारुति स्तोत्र, रामरक्षा, इतर प्रार्थना, काही श्लोक, शेवटी पाढे म्हणायचे असे शिस्तीत ठरलेले असेल ते म्हणावेच लागे. हे सर्व म्हटल्याशिवाय जेवण नाही असा आजोबांचा नियम असे. त्याचा अर्था काय, ते कोणी लिहिले आहे किंवा असे कुठलेही प्रश्न त्या वयात पडत नव्हते. फक्त शिस्त पाळायची एव्हढं कळायचं. पण हे सर्व खूप मोठ्ठं झाल्यावर कळायला लागलं. नारद पुराणात लिहिलेलं हे गणपती स्तोत्र नारद मुनींनी लिहिलेलं आहे हे कळलं. नारद म्हणजे आम्हाला फक्त पौराणिक चित्रपट किंवा कथांमधून दिसले आहेत. पण पत्रकारितेचे उच्च शिक्षण घेताना चिपळ्या आणि वीणाधारी नारदांचे एक वेगळे रूप समजले. ते म्हणजे,आद्य पत्रकार नारद ऋषि. नारायण नारायण !

नारायण नारायण .. असे विणेच्या झंकाराच्या पार्श्वभूमीवर उद्गार ऐकले की नारद मुनींचा प्रवेश होणार हे लगेच कळायच. जणू काही एंट्रीला may i come in असेच विचारत असतील आणि ज्या लोकांमध्ये एंट्री घेतली ते सर्व लोक साहजिकच सावध होत असणार. आज पत्रकारांना ओळखपत्र/ अॅक्रिडिटेशन दाखवून प्रवेश घ्यावा लागतो. 

देव ऋषि नारद आणि त्यांची परंपरा –

भगवान विष्णुंचे परम भक्त, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र  देवऋषि नारद. नारद मुख्यत: भक्ति मार्ग प्रवर्तक आणि कीर्तन संस्थेचे आद्य प्रवर्तक मानले जातात. तरी ते धर्मज्ञ, तत्वज्ञ, राजनीति तज्ञ आणि संगीतज्ञ होते. ते बृहस्पतीचे शिष्य होते.  

आपण पाहिलेल्या पौराणिक चित्रपटात एका हातात वीणा, दुसर्‍या हातात चिपळ्या घेऊन, नारायण नारायण असा उच्चार करणारे, स्वर्गलोक, पाताळलोक आणि मृत्यूलोक अशा त्रिलोकात मुक्तपणे  संचार करणारे  नारदमुनि यांच्याबद्दल खूप उत्सुकता वाटायची. यांना सगळं माहिती आहे, सगळीकडे यांचा वावर आहे, देव, दानव आणि मानव यांच्या जगात काय चाललय,  हे कसं काय याचं आश्चर्य वाटायचं. पण त्यांना वरदान मिळालं होतं ते कधीही कुठल्याही लोकांत संचार करू शकत. त्यामुळे ते सतत भ्रमण करत असायचे. तिथल्या सर्व सूचना आणि बित्तम बातम्या भगवान विष्णुपर्यन्त  पोहोचवायच्या. दानवांच्या कारवायांना आळा घालायचा, मानवांना दिशा द्यायची आणि देवांना माहिती द्यायची, सल्ला द्यायचा अशी लोककल्याणाबरोबर वार्ता प्रसाराची कामे नारदमुनी करत असत. शस्त्रांमध्ये त्यांना देवाचे मन असेच म्हटले आहे. म्हणून सगळीकडेच त्यांचं महत्वपूर्ण स्थान आहे. देवतांप्रमाणेच दानवांनी पण नारदांचा नेहमीच आदर केला आहे. भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा हे महत्व मान्य केल्याचं भागवत पुराणात सांगितलं आहे.    

त्यांच्यात देवत्व आणि ऋषित्व यांचा समन्वय होता असे म्हणतात. या तिन्ही लोकांत समन्वय साधायचा हे ही कार्य ते करत. म्हणून त्यांना आद्य पत्रकार म्हटले जाते. अध्यात्म, राजनीती, धर्म शास्त्र, यज्ञ प्रक्रिया, संगीत अशा अनेक विषयांचे त्यांना ज्ञान होते. त्यांना भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या तिन्ही काळांचे ज्ञान होते. देव आणि माणूस यांच्यातला दुवा म्हणजे नारद मुनि होते. सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापार युगातही नारदमुनि देव व मानव यांच्यातील संवादाचे माध्यम होते. त्यांनी वार्ता प्रसारित करताना सद्गुणांची कीर्ती सांगणे हे काम हेतुत: केले. मुख्य म्हणजे खडानखडा माहिती नारदांना असायची.

लोकांना न्याय मिळवून देण्याचीच त्यांची भूमिका असयची. पृथ्वी आणि पाताळ लोकातील भक्तांची खरी भक्ति भगवान विष्णु पर्यन्त पोहोचविणे, त्यांना न्याय मिळेल असा प्रयत्न करणे, लोकांवर होणार्‍या अन्यायाची माहिती देवांपर्यंत पोहोचविणे असे काम नारद करत असत. याचं आपल्याला माहिती असणारं उदाहरण म्हणजे भक्त प्रल्हाद,ध्रुव बाळ आणि अंबरीश यांच्या कथा. नारद मुनींनी या सर्वांचं म्हणणं अनेक वेळा नारायणापर्यन्त पोहोचविले होते. त्यांना न्याय मिळवून देण्यात मदत केली होती. एव्हढच नाही तर, दु:खी दरिद्री लोकांचे दु:ख निवारण करणे, दुष्ट, अभिमानी, लोभी आणि भ्रष्टाचारी लोकांचा नायनाट करण्याचे उपाय पण ते सांगत.       

हिन्दी पत्रकारितेच्या विश्वात पहिले हिन्दी वृत्तपत्र ‘उदंत मार्तंड’ हे जुगलकिशोर सुकुल यांनी ३० मे १८२६  रोजी साप्ताहिक स्वरुपात सुरू केले. त्यावर पहिल्या पानावर नारदांचा उल्लेख असे.

नारदमुनी ऋग्वेदातील एक सूक्तकार म्हटले जातात. त्यांच्या ठिकाणी देवत्व आणि ऋषित्व यांचा समन्वय झालेला होता म्हणून त्यांना देवर्षी म्हणतात. असं म्हणतात की वायु पुराणात एकूण आठ देवर्षी असल्याचा उल्लेख आहे, त्यापैकी नारद हे अग्रगण्य आहेत. देवर्षी नारद यांच्याबद्दल अनेक पुराण ग्रंथात माहिती आहे.  नारद पुराण हे नारदांनी रचलेले पुराण आहे . अठरा पुराणांमद्धे हे पुराण सर्व श्रेष्ठ मानले गेले आहे.  

देवर्षी नारद समजले की त्यांचं कार्य समजेल आणि त्यांना विश्वातला पहिला पत्रकार आणि पत्रकारीतेतला आदि पुरुष का म्हटलं आहे ते कळेल. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जे पत्रकारिता क्षेत्राला संबोधले जाते, जे स्थान दिलं जातं, तसेच भारतीय देवतांमध्येही ब्रह्मा, विष्णु, महेश यांच्या नंतर नारद यांचंच स्थान आहे. 

देवर्षी नारद यांची गुण वैशिष्ठ्ये लक्षात घेतली तर आजच्या पत्रकारांचीच ती वैशिष्ठ्ये आहेत हे लक्षात येते म्हणूनच हे गुण कोणते आहेत हे आजच्या पत्रकारिता क्षेत्रात काम करणार्‍यांनी समजून घ्यायला हवेत. सर्वत्र संचार करता करता तिथल्या घटनांनी आपलं ध्येय विचलित होऊ न देता पत्रकाराने आपलं कर्तव्य पूर्ण केलं पाहिजे. सतत सत्याचा शोध घेतला पाहिजे,  चौकस दृष्टी, निरीक्षण शक्ति, जिज्ञासा, संवाद कौशल्य, बहुश्रुतता, याबरोबरच  मैत्री आणि वैर बाजूला ठेवून सत्य, न्याय आणि वस्तुनिष्ठता आंगीकारली पाहिजे. पत्रकारिता करताना ती प्रामाणिकपणे केली पाहिजे, निर्भयपणे केली पाहिजे.

त्यासाठी आज वर्तमानाचे भान ठेवणे, समस्या माहित असणे, संबंधित विषयाचे मूलभूत ज्ञान असणे, आपल्या जीवन मूल्यांची ओळख असणे आणि महत्वाचं म्हणजे आपली परंपरा, आपले प्राचीनत्व, आपली संस्कृती काय आहे याचही ज्ञान असणे आवश्यक आहे,  आपल्या मातृभाषा आणि राष्ट्रीय भाषा माहिती असणेही आवश्यक आहे. असे सर्व विशेष गुण नारद यांच्यामध्ये होते. आजच्या पत्रकारितेत काम करणार्‍या सर्व नव पत्रकारांनी /विद्यार्थ्यानी या नारद जयंती निमित्त ‘नारद- एक पत्रकार’ म्हणून समजून घ्यावेत आणि पत्रकारिता एक व्यवसाय म्हणून, नोकरी म्हणून न करता एक ध्येय म्हणून करावी, मग नक्कीच माध्यमांचे चित्र पालटेल .

© डॉ. नयना कासखेडीकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सावरकर समजून घेताना ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? विविधा ?

☆ सावरकर समजून घेताना ☆ श्री सुनील देशपांडे 

(निमित्त २८ मे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती)

(सावरकरांच्या बाबत यापूर्वी मी दोन लेख लिहिले आहेत. त्याच मालिकेतील हा तिसरा लेख.)

खरं म्हणजे सावरकरांचे चरित्र म्हणजे ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक(?). त्यातील अंदमानातील तुरुंगवास संपेपर्यंतच(?). कारण अनेकांनी तेवढंच वाचलंय. सावरकरांच्या चरित्राला अंदमानातल्या सुटकेचे कुंपण घालून तेवढ्यावरच त्यांचा उदो उदो करणाऱेच जास्त.   त्यानंतर त्यांनी हिंदू समाजातील अनेक दुष्प्रथांवर प्रचंड कोरडे ओढणाऱ्या समाजकार्याबद्दल किती जणांनी सविस्तर जाणून घेतलंय?   सावरकर ब्रिटिशांच्या स्थानबद्धतेमुळे आणि त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळामधील उपेक्षित जीवनामुळे  काहीच करू शकले नाहीत (?) अशा प्रकारचा एक मतप्रवाह असणारेच अनेक.  सावरकरांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि त्यांची प्रभावी विचारसरणी ही समजून घेताना, आपले वाचन अथवा ज्ञान ‘माझी जन्मठेप’ या पुस्तकापुरते (आणि आता सावरकर सिनेमा पुरते) मर्यादित असता कामा नये असे माझे मत आहे.  सावरकरांना टोकाचे हिंदुत्ववादी बनवून त्यांचा हिंदुत्ववाद समजूनही न घेता त्यांना ईश्वरवादी समजणाऱ्या माणसांची संख्याच जास्त आहे असे मला वाटते.

परमेश्वराच्या अस्तित्वाला नाकारा. भजन पूजन करू नका. देवळे बांधू नका. धार्मिक विधी करू नका. धार्मिक परंपरा धरू नका, रूढी या माणसाला नष्टचर्याकडे नेणाऱ्या आहेत. कोणतीही प्रथा काल सुसंगत आणि कालमान परिस्थितीनुसार  बदलता आली पाहिजे. श्रुती आणि स्मृती संपूर्णपणे नाकारणारा आणि त्यांच्या विरोधात प्रचंड लेखन करणारा.  जातीयवाद आणि अस्पृश्यता यांच्याबाबत समाजाशी प्रचंड संघर्ष करणारा. दारू अथवा मांसाहार या गोष्टी चुकीच्या आहेत असे न मानणारा, अर्थात व्यसनाधीन होऊ नका हेही सांगणारा. असा एक जबरदस्त आधुनिक विचारांचा नास्तिक माणूस. याला परंपरावादी लोक हिंदू म्हणून तरी स्वीकारणार आहेत काय हाच मुळातला प्रश्न आहे. हिंदुत्ववादी आणि हिंदूहृदयसम्राट अशी बिरुदावली ज्यांना अर्पण केली आहे त्या सावरकरांना सर्व बाजूंनी समजून घ्यायचे असेल तर, त्यांच्या या विचारांना सुद्धा हिंदुत्वाचे विचार म्हणून स्वीकारले पाहिजे. हे स्वीकारणार आहात काय ? खरे तर त्यांना राष्ट्रनिष्ठसम्राट असे म्हणणे हेच जास्त संयुक्तिक आहे असे वाटते. स्थानबद्धतेत असताना सावरकरांनी  प्रचंड मोठे समाजकार्य केले आहे. 

पु ल देशपांडे यांनी एक छान वाक्य त्यांच्याबद्दलच्या व्याख्यानात सांगितलं आहे की ‘सावरकरांनी माझ्यावर फार मोठे उपकार केले ते हे की, त्यांनी मला नास्तिक बनवलं’  ह्या विचारांशी किती जण सहमत होतील मला शंका आहे.

त्यांचा मुळात राग किंवा वाद हा वर्षानुवर्षे अन्याय व अत्याचार करणारे आणि वर्षानुवर्षे अन्याय व अत्याचार सहन करणारे यांच्यातला वाद होता. मुस्लिमांच्या विरोधात त्यांनी फक्त एखादी व्यक्ती मुस्लिम आहे म्हणून त्यांचा द्वेष करावा असे सांगितलेच नाही. ज्यांच्या निष्ठा इथल्या भूमीशी प्रामाणिक आहेत ते मुस्लिम असले तरी, त्यांना मी हिंदूच म्हणेन असे ते म्हणत. त्यांचा मुळात आक्षेप मुस्लिम समाजाच्या निष्ठा जर आपल्या देशाबाहेरील कुठल्यातरी दुसऱ्या देशात वा देशाशी जोडल्या गेल्या असतील तर ते राष्ट्रनिष्ठ होऊ शकत नाहीत.   अशा राष्ट्रविरोधी विचारांच्या व्यक्तींना विरोध करा. वर्षानुवर्षे ज्यांनी एतद्देशियांवर अन्याय आणि अत्याचार केले त्यांचे समर्थन करणार असाल तर तुम्ही राष्ट्रनिष्ठ नाही.  मग तुम्ही हिंदू असला आणि अस्पृश्यांवर अत्याचार केले असतील आणि त्याचे समर्थक असाल तरीही तुम्ही हिंदू म्हणून घेण्याच्या लायकीचे नाही. एवढे त्यांचे हिंदुत्व वेगळ्या टोकाचे होते.  हे किती जणांना पटणार किंवा पचणार आहे हाच मुळातला प्रश्न आहे.  या देशात ब्रिटिशांचे राज्य नसते तर ते कांही हिंदूंच्या विरोधात सुद्धा लढले असते. सावरकरांच्या मते राष्ट्रवाद हाच हिंदुत्ववाद. परंतु त्यांच्याच काही समर्थकांनी हे वाक्य उलटे करून हिंदुत्ववाद हाच राष्ट्रवाद असे बनवले.

अल्लाउद्दीन खिलजी जेव्हा हिंदूंच्या महिलांवर अत्याचार करत होता हिंदूंची देवळे नष्ट करीत होता त्या जागी मशिदी बांधीत होता हजारो हिंदूंना बाटवून धर्मांतरित करीत होता त्यावेळी तुमचा विठोबा ज्ञानेश्वरांची भिंत चालवत होता? हे वाक्य किती जणांना पचणार आहे?

एके दिवशी सेनान्हाव्याला बादशहाकडे जायला उशीर झाला. तेव्हा विठोबाने सेना न्हाव्याचे रूप घेऊन बादशहाची दाढी केली या घटनेचा उपहास करताना ते म्हणतात ‘ विठोबाने त्याच वेळेला, हिंदूंवर अन्याय आणि अत्याचार करणाऱ्या बादशहाची मान का छाटून टाकली नाही? गुलामांचा देवही गुलामच.’

अशा तऱ्हेने कपोल कल्पित संतांच्या कथांवर त्यांनी प्रखर विचारांचे आसूड ओढले. या कथांमधून किंवा या विचारांमधून लोकांची अन्याया विरोधी लढण्याची अस्मिताच नष्ट करून टाकली.  गुलामगिरी पुढे समाज नतमस्तक होऊ लागला. समाज नेभळट बनला. स्वातंत्र्याची उर्मी समाजात निर्माण करण्यासाठी त्यानंतर खूप त्रास झाला. असे त्यांचे स्पष्ट मत होते.

‘मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव’ ‘दोन शब्दात दोन संस्कृती’ हे निबंध किंवा  एकूणच सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंधाचे दोनही भाग तसेच ‘क्ष किरणे’ वगैरे पुस्तके. हे वाचण्याची तसदी किती जणांनी घेतली असेल? ‘क्ष किरणे’ मध्ये श्रुती आणि स्मृतिंवर त्यांनी केलेली भाष्ये

ही मुळातच आपल्या मनातील धार्मिक परंपरांना उलटेपालटे करणारी आहेत.  ‘गाय केवळ उपयुक्त पशू माता नव्हे,  देवता तर नव्हेच नव्हे’ हे त्यांच्या एका निबंधाचे शीर्षक आहे हे किती जण जाणतात आणि ते पटवून घेऊ शकतात?

परंपरावादी तथाकथित हिंदुत्ववादी  व्यक्तींना न पटणारी, न पचणारी, न आवडणारी किंवा कानावरही पडायला नको वाटणारी अशी वाक्ये ठासून भरलेले सावरकरांचे वाङ्मय वाचताना अशा तथाकथित हिंदुत्ववाद्यांचे काय होईल?

स्वतःच्या सामाजिक विचारांशी सुसंगत अशा व्यक्ती त्यांना मोठ्या प्रमाणात जमवता न आल्यामुळे त्यांनीच स्थापन केलेल्या हिंदूमहासभेला त्यांना सोडचिठ्ठी द्यावी लागली असावी असे आज मला वाटते. स्वातंत्र्योत्तर काळातही त्यांना उपेक्षित जीवन जगावे लागले. कारण त्यांची काँग्रेसने केलेली उपेक्षा हे खरे असले तरी, त्या बरोबरच त्यांच्या हिंदुत्ववादी विचारांशी पटवून न घेता आल्यामुळे तथाकथित हिंदूंनी सुद्धा त्यांची केलेली उपेक्षाही जास्त कारणीभूत आहे. सावरकरांना हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या लोकांनी सावरकरांचे हे विचार तसेच, ते विचार ज्यामध्ये आहेत ते वाङ्मय समाजात पसरूच दिले नाही. त्यांची खरी ओळख समाजाला होणे हे टाळण्यात हिंदुत्ववादी परंतु मनातून सावरकर विरोधी विचारांच्या तथाकथित विचारवंतांनी सावरकरांचे हे विचार समाजामध्ये मोठ्या प्रमाणात पसरवण्याचे टाळले.

त्याचप्रमाणे भाषाप्रेमी, साहित्यनिष्ठ आणि काव्यानंदात वेदना विसरणारे. आपली प्रखर विचारसरणी साहित्यिक आणि कलात्मक स्वरूपात समाजासमोर मांडू शकणारे. मराठीभाषाहृदयसम्राट सावरकर समजून घेणे हा सुद्धा खूप मोठा वैचारिक व्यायाम आहे.

सावरकरांमधील या साहित्यिक पैलूं बाबत सुद्धा फार कमी लिहिलं आणि बोललं गेलेलं आहे अर्थात त्याबाबत पुन्हा कधीतरी. झाला एवढा वैचारिक व्यायाम वाचकांना खूप झाला असे वाटते.

© श्री सुनील देशपांडे

२८ मे २०२४

पुणे, मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अंतर दृष्टिकोनातलं ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

अंतर दृष्टिकोनातलं ☆ श्री विश्वास देशपांडे

हिंदीमध्ये ‘ दृष्टिकोन ‘ या मराठी शब्दासाठी ‘ नजरिया ‘ असा एक छान शब्द आहे. नजर आणि नजरिया यात फरक आहे. नजर म्हणजे दृष्टी आणि नजरिया म्हणजे एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन किंवा विचार करण्याची दिशा. त्यावरून एक सुंदर आणि प्रेरणादायी वाक्य आहे. ‘ नजर बदलो, नजारे बदल जायेंगे, सोच बदलो सितारे बदल जायेंगे, कश्तियाँ बदलने की जरुरत नहीं, दिशा बदलो, किनारे खुद-ब-खुद बदल जायेंगे. ‘

या वाक्याची आठवण येण्याचं कारण म्हणजे दोन वेगवेगळ्या पुस्तकांचं वाचन करत असताना, त्यातील काही प्रसंग वाचून मनात उठलेली विचारांची वादळं. त्या दोन गोष्टींनी मनाला अगदी हलवून सोडलं. व पु काळेंचं ‘ माझं माझ्यापाशी ‘ या नावाचं एक अतिशय सुंदर पुस्तक आहे. ते वेळ मिळाला की मी अधूनमधून वाचत असतो. या पुस्तकात ‘ अमर चित्रपट ‘ या नावाचा एक लेख आहे. त्यात ‘ प्रभात ‘ चित्रपट निर्मित १९३७ सालच्या ‘ कुंकू ‘ चित्रपटाबद्दल अतिशय मूलभूत विचार वपुंनी मांडले आहेत. दुसरं पुस्तक मी सध्या वाचतो आहे त्याचं नाव आहे ‘ आश्रम नावाचं घर : कहाणी श्रद्धानंद महिलाश्रमाची ‘. अचला जोशी यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. आधी या दोन घटना कोणत्या ते जाणून घेऊ या.

आजच्या काळात बालाजरठ विवाह होत नाही पण काही वर्षांपूर्वी असे विवाह सर्रास होत असत. बालाजरठ विवाह म्हणजे एखाद्या अगदी कोवळ्या लहान मुलीचे लग्न साठ सत्तर वर्षाच्या वृद्धाशी लावणे. नाटककार गो ब देवल यांचं ‘ संगीत शारदा ‘ हे नाटक याच विषयावर आधारित आहे. ‘ कुंकू ‘ या व्ही शांताराम दिग्दर्शित चित्रपटात हाच विषय हाताळला आहे पण जरा वेगळ्या पद्धतीने. ‘ कुंकू ‘ चित्रपटाची सुरुवातच लहान मुले नाटकाचा खेळ खेळतात आणि त्यात एक सात आठ वर्षांची मुलगी संगीत शारदा मधील शारदा बनते. एक दहा बारा वर्षांचा मुलगा दाढी मिशा लावून वृद्ध बनतो. शारदेचा विवाह या वृद्धाशी लावून देण्याचा प्रसंग येतो, तेव्हा ही चिमुरडी मुलगी मी म्हाताऱ्याशी लग्न करणार नाही असं ठणकावून सांगते. तिला मग इतर मुलं सांगतात की अगं, हे नाटक आहे. नाटकापुरती भूमिका करायची. पण नाटक म्हणून सुद्धा ती वृद्धाशी लग्न करायला सुद्धा नकार देते. मग पुढे चित्रपटातील कथा सुरु होते. चित्रपटातील नीरा नावाच्या नायिकेचा विवाह तिचा दारिद्र्याने गांजलेला आणि पैशाचा लोभी असलेला मामा वकील असलेल्या आणि ज्यांना सगळे काकासाहेब असे संबोधतात अशा एका वृद्धाशी लावून देतो.

नीरासुद्धा आपल्या मनाविरुद्ध झालेल्या या लग्नाबद्दल जणू बंड करून उठते. ती ग्रुप फोटो काढायच्या वेळी सुद्धा येत नाही. त्यावेळी तिचा मामा तिला म्हणतो, ‘ फोटोला सुद्धा आली नाहीस. तुला जराही लाज वाटली नाही का ? ‘ तेव्हा ती त्या मामांना, मामीला आणि ज्यांच्याशी लग्न झाले त्यांना खडे बोल सुनावते. ती म्हणते, ‘ एका लहान तरुण मुलीचा वृद्धाशी विवाह करताना, गरीब गायीला कसायाच्या गळ्यात बांधताना तुम्हाला लाज नाही वाटली ? ‘ ती आपल्या नवऱ्याला, काकासाहेबांना म्हणते, ‘ तुमच्या मुलीच्या\नातीच्या वयाच्या मुलीशी लग्न करताना तुम्हाला लाज नाही वाटली ? लाज तर तुम्हाला वाटायला हवी. ‘

ती आपल्या पतीच्या खोलीत त्याच्याबरोबर झोपायला जात नाही. घरातील मोठ्या बायकांचं सांगणं ऐकत नाही. तिचा तिच्या मनाशी आणि या सगळ्यांशी उघड संघर्ष सुरु आहे. त्या घरात पूर्वीच्या काळातील षट्कोनी आकाराचे एक टोल देणारे लंबकाचे घड्याळ दाखवले आहे. ते घड्याळ एकदा बंद पडलेले असते. तेव्हा काकासाहेब आपल्या वृद्ध नोकराला घड्याळाला चाबी दिली नाहीस का असे विचारतात. तो नोकर म्हणतो, ‘ मालक, ते घड्याळ बी आता माझ्यासारखंच म्हातारं झालं आहे. कितीबी चाबी द्या, कव्हा बंद पडंल त्याचा नेम न्हायी. ‘ हे वाक्य तो बोलतो स्वतःसाठी पण ते झोंबतात मात्र काकासाहेबांना. हे घड्याळ म्हणजे जणू काकासाहेबांच्या वृद्धत्वाचे प्रतीक.

चित्रपटात एक क्षण असा येतो की काकासाहेबांना आपल्या वागण्याचा पश्चाताप होतो. ते नीरेचं कुंकू आपल्या हातानं पुसतात. त्यावेळी नीरा देखील वाघिणीसारखी चवताळून उठते. आता कुंकू लावीन तर काकासाहेबांच्या हातूनच असा निश्चय ती करते. एखाद्याचं हृदयपरिवर्तन, विचारपरिवर्तन होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तीच या चित्रपटात दाखवली आहे आणि तेच या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे. शेवटी काकासाहेब नीरेच्या कपाळी कुंकू लावतात पण ते पित्याच्या मायेनं. मनातली वासना नष्ट झालेली असते. यावेळी समाज काय म्हणेल असा विचार करत असलेल्या नीरेला ते म्हणतात, ‘ कसला विचार करतेस या जगाचा ? ज्या जगाला एका तरुणीचा एका म्हाताऱ्याशी विवाह लावून देताना काही वाटलं नाही अशा जगाचा काय विचार करायचा ! पित्याच्या जागी असलेल्या वृद्धानं आपल्या तरुण बायकोला मुलगी समजून शुद्ध भावनेनं कुंकू लावलं हे जर चालणार नसेल तर अशा समाजाची काय पर्वा करायची ?

चित्रपटात शेवटी काकासाहेबांना आत्महत्या करताना दाखवलं आहे. मृत्यूपूर्वी ते आपल्या तरुण पत्नीला लिहिलेल्या पत्रात म्हणतात, ‘ बाळ, माझ्या मृत्यूशिवाय तुझी सुटका होणं शक्य नाही हे मी जाणून आहे. माझ्या मृत्यूनंतर तो पुनर्विवाह करावास, तुला भरपूर संसारसुख मिळावं अशी माझी इच्छा आहे. त्याशिवाय माझ्या आत्म्याला शांतता मिळणार नाही. तुझा प्रेमळ पिता. ‘ इथे खरं तर चित्रपट संपतो पण खरा चित्रपट सुरु होतो तो आपल्या मनात. मनाला आतून हलवून टाकण्याची ताकद या चित्रपटातील घटनात आहे. व्ही शांताराम यांचं दिग्दर्शन तर अप्रतिम. वपुंनी या चित्रपटाबद्दल फार सुंदर आणि सविस्तर लिहिलं आहे. ते मुळातूनच वाचावं. ते वाचून मी हा चित्रपट आवर्जून पाहिला. 

दुसरी घटना आहे ‘ आश्रम नावाचं घर ‘ या पुस्तकातली. श्रद्धानंद महिलाश्रमाची ही कहाणी आहे. या आश्रमाने अनेक निराधार स्त्रिया, विधवा, अन्याय, अत्याचाराने होरपळलेल्या स्त्रियांना आधार दिला आहे. अशा अनेक स्त्रियांच्या कहाण्या या पुस्तकात वाचायला मिळतात. त्यातीलच एक कृष्णाबाई. तिची कहाणी वाचून मी अस्वस्थ झालो आणि वाईटही वाटले. न कळत्या वयात म्हणजे वयाच्या केवळ नवव्या वर्षी कृष्णीचं लग्न एका मोठ्या एकत्र कुटुंबातील मुलाशी झालं. कृष्णेला न्हाण येण्यापूर्वीच मुदतीच्या तापानं तिचा नवरा वारला. माहेरची वाट बंदच होती. सासरच्यांनी तिच्यावर अनेक बंधनं लादली. तिला बाहेर जायलाच काय पण बाहेरच्या घरातही यायला बंदी केली. पण कृष्णी जसजशी वयात येऊ लागली,तशी घरातल्या कर्त्या पुरुषांनी तिच्यावर वाईट नजरेनं पाहायला सुरुवात केली. कधी सासूबाई चार दिवस बाहेरच्याला बसल्या तर सासरे तिला पाय चेपायला बोलावू लागले. एके दिवशी पाय चेपता चेपता त्यांनी दार बंद करून घेतलं. नंतर चुलत सासऱ्यांनी हाच कित्ता गिरवला. कृष्णीला सुरुवातीला जरा वेगळं वाटलं. अर्थात बरं वाईट कळण्याचं तिचं फारसं वय नव्हतं आणि जे काही घडत होतं त्यात तिचा दोषही नव्हता. पण तिने आपल्या सासूबाईंच्या कानावर ही गोष्ट घातली. पण घरातील कर्त्या पुरुषांसमोर बोलण्याची त्यांची प्राज्ञा नव्हती. पुरुष जे काही आपल्याला देतात ते मुकाट्यानं घ्यायचं असं त्यांनी कृष्णीला सांगितलं. तीस माणसांच्या एकत्र कुटुंबात ही गोष्ट कर्णोपकर्णी व्हायला कितीसा वेळ लागणार ? दिरांनीही तिचा फायदा घायला सुरुवात केली. लवकरच ती घरातल्या सर्वांची हक्काची मत्ता झाली. अशातच तिला दिवस राहिले. मग तिच्या सासऱ्यांनी तिला आश्रमात आणून सोडले. तेव्हा तिला नववा महिना लागला होता. बाळंत झाल्यावर मुलाला आश्रमातच सोडून सासरी परत यायला तिला सासऱ्यांनी बजावले होते.

आश्रमातील बाईंना तिची ही अवस्था पाहून वाईट वाटले. त्यांनी तिला समजावून सांगितले की बाळ तू इथेच निर्धास्तपणे राहा. इथे कोणीही तुला त्रास द्यायला येणार नाही. पण कृष्णीचा मनात परत जायचे होते. तिला त्या जीवनाची चटक लागली होती. बाईंनी तिला सांगितलं की तुझं रूप, वय साथ देतं आहे, तोपर्यंतच तुला सासरी विचारतील. एकदा का वय सरलं की मग तुझे हाल कुत्राही खाणार नाही. एके दिवशी कृष्णी प्रसूत झाली. तिनं एका गोंडस मुलाला जन्म दिला. एका सकाळी कोणाला नकळत त्या बाळाला तिथेच टाकून कृष्णी पुन्हा आपल्या सासरी निघून गेली.

तसं पाहिलं तर या दोन घटनांचा परस्पर संबंध काही नाही. ‘ कुंकू ‘ चित्रपटातील नीरा आणि या महिलाश्रमात आलेली कृष्णी या दोघीही परिस्थितीच्या बळी ठरल्या. पण दोघींच्या आयुष्याला नंतर जे वळण मिळालं त्यात जमीनअस्मानाचा फरक आहे. निराला बऱ्यावाईटाची जाण आहे. ती परिस्थितीचा बळी ठरली तरी आहे त्या परिस्थितीत जगण्याचे ती नाकारते. परिस्थितीविरुद्ध बंड करून उठते. तिच्या वागण्याने काकासाहेबांना सुद्धा आपल्या चुकीची जाणीव झाली आहे. तिने पुन्हा लग्न करून तिचा संसार भविष्यात फुलावा यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याचे समर्पण केलं. याउलट गोष्ट कृष्णीची आहे. ती जरी परिस्थितीची बळी ठरली आणि जे काही घडले त्यात तिचा दोष नसला, तरी मुळातच त्या नरकात आपले आयुष्य वाया घालवण्यापेक्षा काही वेगळा विचार ती करू शकली असती. तिला उर्वरित आयुष्य महिलाश्रमात घालवून स्वतःची प्रगती साधता आली असती. पुढे शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहता आले असते. पण अशा प्रकारची उर्मीच तिच्या मनात उठत नाही. हा दृष्टिकोनातला फरक नीरा आणि कृष्णी यांच्यात आपल्याला दिसतो.

आहे त्या परिस्थितीत तसेच जगणे किंवा कसेबसे दिवस काढणे याला जगणं म्हणता येणार नाही. परिस्थितीशी संघर्ष तर सगळ्यांच्या नशिबी असतो. पण मी आहे त्याच परिस्थितीत राहणार नाही. स्वकष्टाने, प्रयत्नाने, बुद्धीने, जिद्दीने मी पुढे जायचा प्रयत्न करीन यातच मानवी जीवनाचे साफल्य आहे. मी जे कोणते काम करतो, ज्या कोणत्या पदावर आहे, त्यापेक्षा आणखी काही वर्षांनी मी नक्कीच पुढे गेलेलो असेन, मी काहीतरी नवीन शिकेन. ज्या परिस्थितीत मी जन्मलो, जगलो त्याच परिस्थितीत नक्कीच निवृत्त होणार नाही, त्याच परिस्थितीत नक्कीच मरणार नाही अशा प्रकारची दुर्दम्य आशा आणि जिद्द जो मनात बाळगतो, त्याच्या आयुष्याचे सोने होते. यातील आहे त्याच परिस्थितीत खितपत राहून आनंद मानणाऱ्या व्यक्तींची प्रतिनिधी कृष्णी  आहे तर प्राप्त परिस्थितीशी संघर्ष करून पुढचं प्रगतीचं पाऊल टाकू पाहणाऱ्या व्यक्तींची प्रतिनिधी नीरा आहे. हा दृष्टिकोनातला फरक आहे. म्हणून त्या प्रसिद्ध हिंदी ओळी पुन्हा आठवतात. ‘ नजर बदलो, नजारे बदल जायेंगे, सोच बदलो सितारे बदल जायेंगे, कश्तीया बदलने की जरुरत नहीं, दिशा बदलो, किनारे खुद-ब-खुद बदल जायेंगे.’

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रसाद घेतल्याशिवाय कुणीही जायचं नाही ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

☆ प्रसाद घेतल्याशिवाय कुणीही जायचं नाही ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

प्र सा द !

“प्रसाद घेतल्याशिवाय कुणीही जायचं नाही !’

आपण एखाद्या पूजेला कोणाकडे गेलो असता, तिथल्या यजमानांनी हसत हसत दिलेली ही प्रेमळ तंबी आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची आहे. आणि जर ती पूजा “सत्य नारायणाची” असेल तर मग काय बोलायलाच नको ! कारण त्या पूजेचा जो प्रसाद असतो तो करण्याची एक विशिष्ठ पद्धत असते, हे आपल्याला ठाऊक आहेच. त्यामुळे त्या प्रसादाला एक वेगळीच चव प्राप्त झालेली असते.  गोडाचा शिरा  करतांना जे पदार्थ लागतात तेच पदार्थ हा सत्य नारायणाचा प्रसाद करतांना लागतात, पण त्यांचं प्रमाण थोडं वेगळ असतं.  त्यामुळंच की काय तो सारखा खातच रहावा असं मला वाटतं, पण प्रसाद हा प्रसाद असल्यामुळे तो निगुतीने पाडलेल्या छोट्या मुदीच्या रूपात, कागदाच्या द्रोणात आपल्या समोर येतो.  अशावेळी मग मी धीर करून आणि सत्य नारायणाची क्षमा मागून, यजमानांकडे आणखी एक प्रसादाचा द्रोण मागून घेतो. पण जर पूजेचे यजमान आणि यजमाणिन बाई माझ्या जास्तच परिचयातल्या असतील तर मग माझी प्रसादाची चंगळ झालीच म्हणून समजा ! “वाहिनी काय तुमच्या हाताला चव आहे हो ! असा प्रसाद गेली कित्येक वर्ष या मुखात पडला नाही. निव्वळ अप्रतिम !” असं नुसतं बोलायची खोटी, की लगेच वाहिनीसाहेबांचा चेहरा, प्रसाद करतांना जसा रवा फुलतो तसा फुलतो आणि “भाऊजी एक मिनिट थांबा हं, मी आलेच !” असं म्हणून ती माऊली किचन मध्ये जाते आणि दोन मिनिटात माझ्या समोर प्रसादाचा डोंगर केलेली एक छान डिश माझ्या हातात देते. अशावेळी मग मी सुद्धा मानभाविपणे “अहो काय हे वहिनी, घरी जाऊन मला जेवायचे आहे, एवढा प्रसाद खाल्ला तर…..” “काय भाऊजी एवढ्याश्या प्रसादाने तुमची भूक थोडीच भागणार आहे? काही होतं नाही, आज थोडं उशिराने जेवा.”  असं म्हणून दुसऱ्या पाहुण्यांच्या सरबराईला जाते. मग मी सुद्धा फारसे आढे वेढे न घेता त्या डोंगरूपी चविष्ट प्रसादाची चव, जिभेवर घोळवत घोळवत, माझ्या पोकलेनरुपी रसनेने त्याला आडवा करून मनोमन वहिनींना धन्यवाद देतो!

“भक्तांनो गडबड करू नका, रांगेत या! कितीही वेळ लागला तरी महाराज सगळ्यांना प्रसाद देऊन उपकृत करणार आहेत !”

लाऊड स्पीकरवरून महाराजांचा शिष्य सतत घोषणा करत होता. प्रचंड अशा उघड्या मैदानावर सामान्य भक्तगण रणरणत्या उन्हाची पर्वा न करता, आलिशान अशा वातानुकुलीत तंबूमध्ये मखमली गाद्या गिरद्यावर बसलेल्या महाराजांचे दर्शन घेण्यासाठी ताटकळत उभा होता.  कित्येक मैलाची पायपीट करून अनेक भक्तगण दुरून दुरून महाराजांची कीर्ती ऐकून आले होते. महाराजांची ख्यातीच तशी होती. कुठल्याही संकटातून महाराज त्यांच्या प्रसादाने भक्तांना मुक्त करत. अगदी ज्यांना मुलबाळ नाही त्यांना सुद्धा महाराजांच्या प्रसादाने मूलं झाल्याच्या बातम्या शहरभर पसरल्या होत्या. अनेक असाध्य रोग महाराजांच्या प्रसादाने बरे झाल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या. अशा प्रभावी महाराजांचे दर्शन आणि त्यांचा प्रसाद घेण्यासाठी इतकी झुंबड मैदानावर उडणं साहजिकच होतं.

VIP लोकांची रांग वेगळी. त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यासाठी मैदानाचा एक कोपरा राखून ठेवला होता. महाराजांचे अनेक शिष्य आणि शिष्या VIP लोकांचं स्वागत करण्यासाठी सज्ज होत्या. मैदानाला जणू जत्रेच रूप आलं होतं. महाराजांच खटलंच तसं मोठं होतं !

कुणाचा बसलेला धंदा महाराजांच्या प्रसादाने पुन्हा उभा राहून नावारूपाला आला होता. एखाद्या बड्या सरकारी अधिकाऱ्याची बढती, बदली अडली असेल तर महाराजांच्या प्रसादाने ती मार्गी लागत असे. एवढंच कशाला मंत्री मंडळात खाते वाटप करतांना खात्या पित्या खात्यात वर्णी लागण्यासाठी सुद्धा अनके मंत्री महाराजांच्या प्रसादासाठी त्यांच्या पायावर लोटांगण घालीत ! महाराज म्हणजे जणू परमेश्वराचा अवतार आणि त्यांनी दिलेला प्रसाद म्हणजे जणू कुठल्याही संकटावरचा रामबाण उपाय असं समीकरणच झालं होतं !

मुलांनो, पुरे झाला तुमचा खेळ. मुकाट्यानं घरात या नाहीतर माझ्या हातचा धम्मक लाडूचा प्रसाद मिळेल बरं कां !

उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला गेल्यावर मुलांना किती खेळू आणि किती नको असं होऊन जात. अगदी दिवेलगणीची वेळ झाली तरी खेळ म्हणून संपत नाही त्यांचा. मग आईचा धम्मक लाडूचा प्रसाद चुकवण्यासाठी मुलं नाईलाजाने घराकडे वळत.  कारण आईचा प्रसाद एक वेळ परवडला, पण तिने जर बाबांना सांगितलं तर मग आपलं काही खरं नाही हे तेंव्हाची मुलं चांगलंच जाणून असायची. त्यामुळे आईने बोलावल्यावर “पाचच मिनिटं” असं सांगून मुलं पुन्हा खेळायला लागायची.

आई बाबांच्या हातचा प्रसाद त्यावेळेस एक वेळ ठीक होता, पण शाळेतला गुरुजींच्या हातचा, हातावरचा छडीचा प्रसाद हाताला थोडे दिवस तरी जायबंदी करून जात असे, डोळ्यातून पाणी काढत असे. आणि गुरुजींच्या छडीच्या प्रसादाची जागा हाता ऐवजी पार्श्वभागावर आली तर उठता बसता त्या प्रसादाची आठवण होई. तेंव्हाचे गुरुजी पण हुशार. पार्श्वभागावर प्रसाद देतांना शाळेच्या गणवेशाची अर्धी विजार, त्या मुलालाच पुढून घट्ट ओढून धरायला सांगत आणि मगच छडीच्या प्रसादाचे वाटप करीत. एवढा प्रसाद खाऊन वर पुन्हा वर्गातल्या मुलींसमोर रडायची चोरी! कारण मुली काय म्हणतील याची मनांत भीती. आणि हे प्रकरण घरी कळलं तर, चेरी ऑन द केक प्रमाणे वडिलांच्या हातचा प्रसाद मिळायचा तो वेगळाच !

इति प्रसाद पुराणं समाप्तमं !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “मुबंईचा डबेवाला…” ☆ श्री रत्नाकर दिगंबर येनजी ☆

? विविधा ?

“मुबंईचा डबेवाला…” ☆ श्री रत्नाकर दिगंबर येनजी

काही दिवसांपुरी एका  व्हाट्सअप ग्रुपवर माझ्या एका जीवलग मित्राने एक पोस्ट शेअर केली होती.त्यात TED वर एक व्यक्ती डबेवाले या विषयावर प्रेझेंटेशन करुन त्यावर Motivation speech देत होती. आता तुम्ही म्हणाल हे TED काय प्रकरण आहे? TEDम्हणजे  (Technology, Entertainment, Design) ही एक Conference असते. जगभर वेगवेगळ्या किंवा युनिव्हर्सिटी कँम्पस किंवा आयोजित केलेल्या चर्चा सत्रात मोठ मोठ्या त्यांच्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या व्यक्तीना आपण यशस्वी कसे झालात या विषयावर कमीत कमी पंधरा ते अठरा मिनिटे बोलायला देतात. त्यात आपण श्रोत्यांपुढे सुंदर परिणामकारक भाषण करुन त्यांची मने जिंकावी लागतात. ह्या भाषणाचे छायाचित्रण करुन ते TED च्या संकेतस्थळावर टाकतात व तिकडुन युट्युब वर सुध्दा प्रसरण होते.यामुळे आपण बोललले पंधरा ते अठरा मिनिटाचे भाषण जगातील करोडो लोकांकडे.  पोहचते.

मी नेहमी युट्युब वर असे TED Motivation speech बघतो छान असतात. यात मी आपला मराठ मोळा सिध्दार्थ जाधव याचे एकदा भाषण पाहीले. आपले जाधव साहेब मस्तच बोलले .छाती गौरवाने फुलुन आली. अशाच एका TED च्या सत्रात आंतरराष्ट्रीय प्रेरणा व्याख्याते (International Motivational Speaker) डाँक्टर पवन अगरवाल यांनी स्वतः A study of Logistics and Supply Chain Management of Dabbawala in Mumbai’. या विषयात प्रबंध लिहुन डाँक्टर ही पदवी ग्रहण केली असल्याने त्यांनी मुंबईच्या डबेवाला या विषयावर रंगमंचावर स्वतः बनविलेले Power point presentation सादर केले.महत्वाचे म्हणजे त्यांनी  सर्वांसमोर डबेवालाचा वेश परिधान करुन उत्तम ईग्रजी भाषेत प्रेझेंटेशन दिले. त्यांचे ते थोडक्यात सादरीकरण खरोखरच प्रेरणादायी व परिणामकारक (Effective) होते.

त्यांच्या सादरीकरणात त्यांनी जी माहिती दिली ती मी आपणास थोडक्यात सांगतो.

मुंबईत १८९० साली ही डबे कामाच्या ठिकाणी नेऊन पोहचवण्याची पध्दत सुरु झाली.आज मुबंईत त ५००० ( पाच हजार) डबेवाले जवळजवळ २००००० ( दोन लाख ) डबे डिलीव्हरी करतात. म्हणजे प्रत्येक डबेवाला दररोज चाळीस डबे प्रत्येक घरातुन पिकअप करतो व जवळच्या स्टेशनवर ड्राँप करुन पुन्हा संध्याकाळी त्याच संध्याकाळी पुन्हा रिकामी आलेला डबा सकाळी जिकडुन डबा घेतला तिकडे पुन्हा रिटर्न करतो. असे हे बारा महीने करावे लागते. आपण हे वाचताना आपले हिशोबी मन विचार करत असेल की याचे चार्जेस किती. याचे चार्ज फक्त साडे तिनशे ते चारशे रुपये.म्हणजे दिवसाला जास्तीत जास्त फक्त पंधरा ते वीस . पंचवीस घेतले तरी डोक्यावरुन पाणी.मला सांगा जी मंडळी स्वतःच्या कार्यालयाच्या दरवाज्या पर्यंत डबा डिलीव्हरी घेतो तो माणूस किंवा व्यक्ती महीना कमीतकमी लाखभर पगार घेत असेल त्याच्या साठी दिवसा (पिकअप व ड्राँप डिलीव्हरी)पंचवीस काहीच नाही. आता त्यांची तुमच्या भाषेत H.R. system कशी ती समजवतो. दहा डबेवाले एका मुकादम च्या हाताखाली काम करतात. मुकादम हे पद त्याच्या अनुभवाने व चांगले काम केल्याने मिळते. पण पण…थांबा या मुकादमाला ईतर डबेवाल्यापेक्षा जास्त पगार असेल अस समजु नका कारण मुकादमाचा पगार पुर्वी डबे डिलीव्हरी करत असताना मिळत होता तेव्हढाच आणि महत्वाचे म्हणजे कोणी डबेवाला आजारी किंवा पुर्व सुचनेनुसार गैरहजर असेल तर या मुकादमाला त्या डबेवाल्याचे काम करावे लागते. लोकांची अडचण किंवा त्याला डबा न मिळाल्याने उपास घडु नये हे उद्दिष्ठ.

१८९० पासून जेव्हा ही डबेवाल्यांची मुंबई भर यंत्रणा राबवायला सुरवात झाली तेव्हापासून त्यांनी प्रत्येक डब्यावर त्यांना समजेल अशा कोडींग व चिन्हांचा वापर करायला सुरुवात केली त्यामुळे कुठलाही डबा हरवला असा प्रश्नच आला नाही.१८९० साला पासुन या मंडळींनी एकदाही संप केला नाही व यांच्यापैकी एकाच्याही नावावर पोलिस केस किंवा तक्रार नाही.

एखादा कस्टमरने फक्त दहा महीने यांच्याकडुन सेवा घेतली तर फक्त दहा महिन्याचे डिलीव्हरी चार्जेस देतो व दोन महिने सुट्टी घेतल्याने त्या दोन महिन्याचे पैसे देत नाही. आपण आपल्या शाळेतल्या स्कुल बससाठी पुर्ण बारा महीन्याचे पैसे देतो हे लक्षात घ्या.

आपण म्हणाल हे सगळे कसे परवडते. कारण यांचे या मागे असते समर्पण (Dedication). ही मंडळी जे ह्या प्रकारचे कार्य करतात ते अस समजुन काम करतात की कस्टमर माझा परमेश्वर ( विठ्ठल) आहे. त्याला दररोजचे जेवण पोचवण्याचं काम म्हणजे एक प्रकारची विठ्ठल सेवा. ही सगळी मंडळी विठ्ठलभक्त वारकरी असतात .याची दखल ब्रिटिश राजपुत्र प्रिन्स चार्ल्स ने जेव्हा घेतली तेव्हा “मुबंईचा डबेवाला” हा धडा जगातल्या मोठमोठ्या मँनेजमेंटच्या इन्स्टिट्यूट मधे शिकविण्यास सुरवात झाली. ब्रिटिश राज घराण्यात जेव्हा कधी लग्न कार्य असते तेव्हा मुबंईचे तीन चार डबेवाले त्या कार्यक्रमात यजमानासाठी आवर्जून मराठ मोळी पैठणीचा आहेर घेऊन हजर असतात.आता महत्वाचा प्रश्न आपल्या डोक्यात मस्त लेझीम खेळत असेल तो म्हणजे यांचे मासिक वेतन किती. एवढे सगळ कौतुक केल्या वर मला सागांयला लाज वाटते. कारण त्यांचे वेतन रुपये पाच हजार फक्त

©  श्री रत्नाकर दिगंबर येनजी

बांगुर नगर, गोरेगाव, मुबंई.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares