मराठी साहित्य – विविधा ☆ मैत्र जीवांचे — ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

🌸 विविधा 🌸

☆ मैत्र जीवांचे — ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

नात्यांची गुंफण आपल्या जन्मापासूनच सुरू होते. बाळाचं आणि आईचं नातं तर त्याही आधी आकारास येतं,पण आपण जन्म घेतो, तो कोणाचा तरी मुलगा /मुलगी म्हणून, आणि मग इतरही सगळी नाती आपोआपच जुळतात-काका, मामा, आजी-आजोबा, मावश्या, आत्या इत्यादि. या नात्यांच्या साथीने आपण लहानाचे मोठे होतो. त्यांच्या प्रेमाने, कौतुकाने फुलतो तर कधी आदर-धाकामुळे, स्वतःचा ढळणारा तोलही सांभाळतो. त्यांच्यापाशी हट्टही धरतो आणि लाडही पुरवून घेतो.

बाळपणीचे खेळगडी, शाळेतले सवंगडी, काॅलेजातले मित्र-मैत्रिणी, नोकरी-व्यवसायातला सहकारी, असा हा परिघ विस्तारतच जातो. प्रेम-विवाह असो अथवा ठरवून केलेला विवाह, जोडीदाराबरोबर वेगळेच रेशीम-बंध जुळतात आणि मग सासू-सासरे, दीर, नणंद, जाऊ इ. नात्यांचे पदरही जोडले जातात.

प्रेम आणि आपुलकीनं जोडलेली नाती आपोआपच दृढ होतात आणि आपलं भाव-विश्वही समृद्ध करतात. काही नाती मात्र आपण कर्तव्य भावनेने सांभाळतो, काही व्यवहार म्हणून तर कधी नाईलाजाने. पण आपल्या मनाची तार जुळणा-या व्यक्ती मात्र फार दुर्मिळ असतात.

अशी व्यक्ती ही ‘रक्ताची नातेवाईक’ असेलच असं नाही, पण ती आपल्याला सगळ्यात जवळची वाटते. ती मित्र-मैत्रिण, शेजारी – पाजारी, कार्यालयातील सहकारी /अधिकारी अथवा अन्य कोणत्याही क्षेत्रातील असू शकते. इथे वयाचा मुद्दा गौणच ठरतो. वैचारिक साधर्म्य, समान छंद/आवड, यापेक्षाही दुस-याला समजून घेण्याची वृत्ती, विश्वासार्हता, सह-संवेदना, या गोष्टी जास्त महत्त्वाच्या ठरतात. समोरच्याचं म्हणणं शांतपणे, लक्षपूर्वक ऐकणं, त्याला मोकळेपणानं बोलू देणं  मग आपली प्रतिक्रिया देणं या बाबी प्रेम आणि विश्वास निर्माण करतात. काही वेळा प्रतिक्रिया नाही दिली तरी चालते, पण नीट ऐकून घेणं , जास्त आवश्यक असतं. त्यामुळे बोलणा-याचं मन मोकळं होतं, त्याच्या मनावरचा ताण हलका होतो. 

या व्यक्तिशी आपला रोज संवाद / संभाषण असेलच, असं नाही. पण मनातलं खास सांगायला मात्र ती हक्काची वाटते. आपलं यश-अपयश, सुख-दुःख, फजिती सारं तिच्याबरोबर अनुभवायला, वाटून घ्यायला, आपल्याला आवडतं. कधी ‘दे टाळी’ म्हणून आनंद साजरा करायला तर कधी खांद्यावर डोकं ठेवून, अश्रू ढाळायलाही तीच व्यक्ती हवी असते आपल्याला. आपली दुखरी नस तिला अचूक सापडते आणि तिच्या बोलण्यात स्पर्शात, आपल्याला ‘आश्वासकता’. 

या व्यक्तीचं अस्तित्वच आपल्याला मानसिक आधार देतं. ती आपल्याला समजून घेईल आपलं चुकत असेल तर चूक दाखवून, ती सुधारायला मदत करेल, हा विश्वास खूप मोलाचा असतो. मी जे काही बोलेन, ते तिच्यापाशीच राहील, ही खूण-गाठ मनाशी असते, म्हणून निःसंकोचपणे सारं तिच्यासमोर मांडता येतं. अशी एकतरी व्यक्ती आपल्या आयुष्यात असेल, तर आपल्यासारखे भाग्यवान आपणंच!

पण आजच्या या ‘आभासी’ जगात असं ‘ मैत्र’ हरवत चाललंय असं वाटतं. लहानांपासून थोरांपर्यंत, सारेच तणावयुक्त आयुष्य जगत आहेत. जगण्याच्या जीवघेण्या स्पर्धेत माणूस फरपटतोय, घुसमटतोय, हरवतोय, हरपतोय. कोवळ्या वयाची मुलं नैराश्यग्रस्त होऊन कधी वाईटमार्गाला जात आहेत तर कधी आयुष्याचा अनुभव घेण्याआधी जीवन संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना गरज आहे ‘मैत्र जीवाचे ‘ भेटण्याची.

चला आपणही कोणासाठी तरी  ‘ मैत्र जीवांचे’ होण्याचा मनापासून प्रयत्न करूया ना! जिव्हाळ्याचं बेट बनून, ढासळणा-या मनांना उभारी देण्याचा ‘ खारीचा वाटा’ तरी उचलूया!

 

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दीप -पूजन… ☆ सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆  विविधा ☆ दीप -पूजन… ☆ सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

आज आषाढ अमावस्या! दीपपूजन! हिंदू धर्मात आपल्या परंपरा निसर्गाशी इतक्या छान जोडलेल्या आहेत की आपण आपोआपच निसर्गाशी एकरूप होतो! मृग नक्षत्रापासून सुरू झालेला पाऊस आषाढ महिन्यात स्थिरावलेला असतो. सगळीकडे सस्यशामल धरती नजरेस दिसत असते, त्यामुळे वातावरणात एक प्रकारचा उल्हास निर्माण होतो. काळोखाच्या रात्री जाऊन श्रावणाची झिमझिमणारी पहाट उद्यापासून सुरू होईल! कोरोनाच्या काळ्या छायेखाली सर्व देश चिंताक्रांत असताना आरोग्याची पहाट सुरू व्हावी म्हणून मोदीजींनी दीपोत्सव साजरा केला होता! नऊ मे रोजी रात्री पणत्या, मेणबत्ती, तसेच विविध प्रकारचे दिवे लावून एकात्मतेचा संदेश देण्यासाठी माननीय मोदीजींनी आवाहन केले होते. भारतीयांची मूळ मानसिकता ही श्रद्धेची आहे.

“तमसो मा ज्योतिर्गमय” अशी प्रार्थना करून हा अंधकार जाऊन प्रकाशाकडे वाटचाल करण्यासाठी आपल्याला बळ मिळू दे, ही या दीपोत्सवातील मुख्य भावना असते. त्यानिमित्ताने आपण दिव्यांना पुन्हा उजाळा देतो. पणती, समई, लामणदिवे, दीपमाळ अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण प्रकाशाची प्रार्थना करतो.. हे मनोभावे केलेले पूजन आपल्याला मार्गदर्शक होणार असते. त्यानंतर येणारा श्रावण महिना सणांची सुरुवात करतच येतो. 

माझा नातू ,तेजस लहान असताना मी त्याच्या शाळेत बरेच वेळा जात असे. त्यांच्या शाळेत ” दीप अमावस्या” हा सण म्हणून साजरा करण्यात येत असे. शाळेच्या प्रवेशद्वारापासूनच वेगवेगळ्या प्रकारच्या दिव्यांची आरास केलेली असे. सर्व छोटी छोटी मुले त्या कामासाठी मदत करत असत. पूर्वीच्या काळापासून वापरात असलेल्या समया,झुंबरे, विविध प्रकारचे दिवे तसेच युद्धाच्या वेळी वापरण्यात येणारे पलिते, पेशवे कालीन दिवे, अशा सर्व प्रकारच्या दिव्यांची माहिती दिली जात असे. सगळीकडे वातावरण दिव्याच्या तेजात उजळून निघे. एखादा वर्ग फक्त अशा विविध प्रकारच्या पेटविलेल्या दिव्यांनी उजळलेला असे.तिथे इलेक्ट्रिसिटी चा अजिबात वापर केलेला नसे. लहान मुले उत्साहाने त्या दीपोत्सवात सामिल झालेली दिसत! अमावस्या असूनही वातावरण अगदी पौर्णिमेच्या चांदण्याप्रमाणे झगमगते दिसत असे! 

आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक सणाला काही वैशिष्ट्यं असते.निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा संबंध विचारात घेऊन त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.पृथ्वी,आप,तेज,वायू, आकाश या साऱ्या पंचमहाभूतांचे स्मरण ठेवणे, पूजा करणे हे आपल्या संस्कृतीतील चांगल्या विचारांचे द्योतक आहे.. इतकेच काय तर प्रत्येक प्राणीमात्रांना आपण महत्त्व देतो.

दीप अमावस्येची रात्र अधिक झाकोळलेली असते.अंधाराचा प्रभाव जास्त असतो.पावसाची रिपरिप चालू असते..अशावेळी आपले मन नकळत निराशाजनक विचारांनी भरण्याची शक्यता असते,पण दीपोत्सव आपल्याला या नैराश्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो.अंधाऱ्या रात्री जाऊन आता तेजाची पहाट येणार आहे हेच जणू दीप सांगत असतो! दिवा  हे उजेडाचे साधन आहे.आणि त्यामुळे मानवाची उन्नतीकडे वाटचाल चालू असते.

यानंतर येणाऱ्या श्रावणात दुष्टांचा संहारक कृष्ण जन्माला येतो,तर नवरात्रात देवीचे रूप हे दुष्टांचा संहार करणारी म्हणून येते.आणि नऊ दिवस दिवा लावून आपण नंतर दसरा साजरा करतो.दिपावली ला तर दिव्यांचे तेज झळाळून येते, कारण नरकासुराचा वध झालेला असतो. या सर्व गोष्टींतून असं लक्षात येतं की ,

दिवा किंवा तेज हे चांगल्या कडे वाटचाल करणारे आणि वाईट गोष्टींचा नाश करणारे असते! त्याची सुरुवात या दिव्याच्या अवसेपासून होते म्हणून ही दिव्याची अमावस्या महत्त्वाची मानली जाते!

या दिवशी आमच्याकडे कणकेमध्ये गूळ मिसळून , उकडून दिवे तयार केले जातात आणि हे कणकेचे दिवे तूप घालून खायला छान लागतात! मुलांनाही या दिव्याच्या खाद्य पदार्थांची मजा वाटते.अशी ही दिव्याची अमावस्या पुढील आनंदाच्या काळाची सुरूवात करणारी असते….

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गुरुपौर्णिमेची पार्श्वभूमी — महर्षी व्यास… — लेखक – डॉ. प. वि. वर्तक ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

? विविधा ?

☆ गुरुपौर्णिमेची पार्श्वभूमी — महर्षी व्यास… — लेखक – डॉ. प. वि. वर्तक ☆ डॉ. ज्योती गोडबोले

आषाढी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा या नावाने ओळखली जाते. व्यास पौर्णिमा असेही तिला म्हणतात; कारण महर्षि व्यास मुनी हे सर्वांचे गुरु मानले गेले आहेत. व्यासांचा जन्म या तिथीला झाला अशी एक कल्पना आहे. पण ती उचित नाही; कारण व्यासांचा जन्म कधी झाला हे त्यांनी कुठेच नोंदलेले नाही.

व्यासांचा जन्म एका द्वीपावर झाला व ते वर्णाने काळे होते. म्हणून त्यांना कृष्ण द्वैपायन असे नाव मिळाले. परंतु पुढे त्यांनी वेदांची व्यवस्था लावली म्हणून त्यांना ‘व्यास’ ही पदवी मिळाली. पराशर ऋषींपासून मत्स्यगंधा सत्यवतीस जो पुत्र, अविवाहित अवस्थेत झाला तोच व्यास. शूद्र कोळिणीपासून जन्म झाल्यामुळे हा पुत्र जन्मतः शूद्र असला तरी स्वकर्तृत्वाने तो ब्राह्मण ठरला. ब्राह्मणांमध्येही  वरिष्ठ ठरला. बालपणीच तपस्या आरंभून तो मुनिश्रेष्ठ, सिद्ध पुरुष झाला. सिद्धी मिळाल्यावर मातेस सोडून दूर जातांना त्याने सांगितले की ‘ तू स्मरण केलेस की मी लगेच भेटेन.’ 

व्यास हे महाभारत हा काव्यात्मक इतिहास लिहिण्यामुळे ख्याति पावले. अठरा पुराणेही नंतर त्यांनीच रचली अशी कल्पना आहे. महाभारत हा अतिविस्तृत एक लक्ष श्लोकांचा ग्रंथ लिहिणे योजले, तेव्हा इतके लिहिणार कोण हा प्रश्न पडला. गणपतीने लेखन करण्याचे काम पत्करले, पण त्याने अट घातली की तू सांगितलेले मी लिहीले पण तू पुढे लगेच सांगितले नाहीस तर मी काम बंद करीन. व्यासांनी ही अट घातली की तू समजल्याविना लिहिता कामा नये. अटीतटीने हा सामना चालू झाला. व्यास शीघ्र कवि असले तरी केव्हा तरी अडचण येई; तेव्हा व्यास गूढ श्लोक सांगत. त्यावर विचार करत गणपती बसला की हे पुढील रचना करीत. महाभारतात असे 8800 गूढ श्लोक आहेत.

महाभारतात असंख्य विषय मांडलेले आहेत. ते सगळे ज्ञानी व्यासांनी पचविलेले होते. नियोग पद्धतीने त्यांनी धृतराष्ट्र, पंडू, व विदूर यांना जन्म दिला. ते स्वतः शास्त्रज्ञ, सायण्टिस्ट होते. त्यामुळे त्यांनी गांधारीचा पाडलेला गर्भ घेऊन, त्यावर संशोधन करून शंभर कौरव निर्माण केले. क्रोमोसोम्सचे पूरे ज्ञान त्यांना होते, त्यामुळे त्यांनी ‘गुणविधी’ हे सायंटिफिक नाव त्यांनी त्या तत्त्वांना योजले. गुण व विधी म्हणजे कामे ठरविणारी ही तत्त्वे २३ असतात हेही त्यांनी नोंदलेले आहे. आज सायन्स क्रोमोसोम्स २३ आहेत असेच म्हणते. यावर अनुवंशिक रोग अवलंबून असतात हे व्यासांचे म्हणणेही सायन्सने आता मानले आहे. व्यासांना खगोलशास्त्रही अवगत होते. त्यांनी श्वेत, श्याम व तीव्र या नावाखाली युरेनस, नेपच्यून, प्लुटो या ग्रहांची स्थाने महाभारत युद्धसमयी कुठे होती ते नोंदलेले आहे. सर्व ग्रहांची स्थाने त्यांनी दोन पद्धतीने म्हणजे सायन-निरयन मानाने नोंदलेली आहेत. त्यावरून महाभारतीय युद्ध रविवार दि.१६ ऑक्टोबर ५५६१ इसवीसनपूर्व  या दिवशी झाले हे मी निश्चित ठरवू शकलो.

अभिजित नक्षत्र गगनातून ढळले होते ही वैज्ञानिक सत्यकथा त्यांनी महाभारतात लिहून ठेवली आहे. असंख्य नक्षत्रे गगनात असूनहि केवळ एकाबद्द्ल ते सांगतात आणि आजचे विज्ञान नेमके तेच नक्षत्र इ.सनपूर्व १२००० वर्षे या काळी ढळले होते हे मानते, यावरुन व्यासांच्या दिव्य ज्ञानाची पारख होते. ‘जी हलत नाहीत ती नक्षत्रे ही व्याख्या असली तरी नक्षत्रेही हलतात’, असे व्यास म्हणतात, तेहि आजचे विज्ञान मानते आहे.

महाभारतयुद्धारंभी अमावस्या होती हे सांगून ते म्हणतात की सूर्य उगवताच दोन भागांचा झाला व किरण फेकण्याऐवजी ज्वाला फेकू लागला. आजचे विद्वान यावरुन व्यासांना मूर्ख ठरवू बघतात कारण सूर्याचे दोन भाग कसे होतील असे त्यांना वाटते. पण ग्रहणसमयी सूर्य खरोखरीच दोन भाग दर्शवितो, मध्ये काळी तबकडी व भोवती प्रभामंडळ. खग्रास सूर्यग्रहणसमयी खरेच प्रचंड ज्वाला सूर्यपृष्ठावरुन उफाळलेल्या दिसतात असे आजचे सायन्स सांगते.

‘व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्|’ व्यासांनी सारे जग उष्टे करुन टाकले आहे’, असे म्हणतात ते यावरुन सत्य ठरते. कारण व्यासांना ज्ञात नाही असे काहीच नाही. आजच्या काळातील सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ आईन्स्टाईन याने सिद्धांत मांडला की जो कुणी अतिवेगाने अंतराळात जाऊन परतला तर त्याचे आयुष्य वाढले असल्याचे आढळेल. नेमका हाच सिद्धांत व्यासांनी एका कथेतून सांगितला आहे की ककुद्मी आपली कन्या रेवती हिला घेऊन ब्रह्मलोकी वरसंशोधनासाठी गेला आणि २७ चतुर्युगांनी म्हणजे किमान २१६ वर्षांनी परतला, तरी तो जिवंत राहिला आणि रेवती तरुणच राहिली होती. तिचे लग्न बलरामशी लावले. प्रत्येक ग्रहावर काल भिन्न असतो हे तत्त्वहि व्यासांनी या कथेत सांगितले आहे.

परा व अपरा या दोनही  विद्यांवर त्यांनी प्रभुत्व मिळविलेले होते. सिद्धीहि मिळवलेल्या होत्या. दिव्य दृष्टीची सिद्धी त्यांनी स्वतःच शिष्य संजय यास दिली होती; येवढे सामर्थ्य होते. त्यामुळे ते जगत्गुरु ठरले; त्यांचा मान राखण्यासाठी गुरुपौर्णिमेस व्यासपौर्णिमा मानतात.

♥ ♥ ♥ ♥ ♥

लेखक : डाॅ.प.वि.वर्तक – पुणे

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ = आषाढी अमावस्या = ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

☆ = आषाढी अमावस्या = ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

आज आषाढी अमावस्या! आषाढाचा शेवटचा दिवस! 

आषाढघन अोथंबायच्या थांबून श्रावणसरींच्या हाती आपला वसा देणारा निसर्गाचा अद्भूत खेळ!!याच अमावस्येला लोक दिव्याची अवस म्हणतात तर कोणी गटारी अमावस्या म्हणतात.व्यक्ती तितक्या प्रवृत्ती त्यामुळे नक्की काय म्हणायचं? दिव्याची••••• का गटारी•••• हे ज्याचं त्यानं ठरवायचं!

या दिवशी छान पुरणाची दिंड करतात. किंवा हल्ली कणकेची दिंड करून ती डाऴफळादारखी शिजवतात.आणि मग स्त्रियांना दुसरा उद्योगच नसल्याप्रमाणे त्या खायला अजून काही वेगवेगळंया पदार्थांची रेलचेल  करतात. मग अशावेळी श्रावण सुरू होणार म्हणून नको इतके ढोसून गटारात पडून गाढवावरून धिंड ••••• कि घरच्या लक्ष्मीच्या हातची दिंड ••••• हे ज्याचे त्याने ठरवायचे !

उद्यापासून श्रावण सुरू होणार.सणांची उत्सवांची रेलचेल राहणार. त्यासाठी लागणाऱ्या समया निरांजने देवापुढे ठेवायची साधने घासून लखलखीत करायची. मग ही अमावस्या जाऊन प्रकाश यावा  म्हणून हे दिवे उजळायचे•••• कि तुमच्या अंगातील दिवे पाजळायचे•••• हे ज्याचं त्यानं ठरवायचं!

ह्या उजळलेल्या ज्योती किती समाधान शांती देत असतात ते खरं तरं अनुभवायचं असतं. पण या ज्योतीच्या प्रकाशात न्हायचं•••• कि मनाची अमावस्या करून घेऊन गटारगंगेत पडायचं? ••••• हे ज्याचं त्यानं ठरवायचं !

दिप उजळून दिव्याचा झगमगाट दिव्याचे तेज हे सारे आनंदाने पाहून तमसो मां ज्योतिर्गमय प्रार्थना करून दिपोज्योती नमोस्तुते म्हणायचं••••• कि  श्रावण येणार या नावाखाली बार किंवा चार मंडळींची टोळकी जमवून चिअर्स गीते म्हणायची••••• हे ज्याचं त्यानं ठरवायचं !

आपले संस्कार आपली संस्कृती नेहमी आपल्याला  चांगले शिकवत असते. त्याचे स्मरण या अशा उत्सवाच्या सणाच्या निमित्ताने करायचे असते. मग अशा छान क्षणी त्याप्रमाणे संस्कारांची दिवाळी साजरी करायची••••• कि मदिरापानाचे सोहाळे करत संस्कृतीचे दिवाळे काढायचे•••• हे ज्याचं त्यानं ठरवायचं !

त्यावरून आजच् दिव्याचं महत्व जाणून दिव्याची आरास करायची किंवा दिव्याची रोषणाई करायची ••••• कि हातात बाटली ग्लास घेऊन मदिरेची षोषणाई करायची?••••• हे ज्याचं त्यानं ठरवायचं !

दिवे लाऊन अंधारावर मात करून त्यावर अधिराज्य गाजवायचे?••••• कि स्वत:ची शुद्ध हरखून झिंगत राहून घाणेरड्या अंधारात अंग माखायचं? ••••• हे ज्याचं त्यानं ठरवायचं !

आधुनिक जगातआपण सारेच वावरत आहोत. काळाप्रमाणे चालायला सगळ्यांनीच शिकलं पाहिजे. पण त्याबरोबर चांगल्या वाईटाचा विचार करणारी सारासार बुद्धीही जागृत ठेवली पाहिजे. ज्या त्या वेळेचे महत्व काय आहे हे जाणले पाहिजे आणि मग अशावेळी ज्योतीने ज्योत लावून प्रेमाची गंगा वाहण्याचा मिळालेला संदेश जपायचा ••••• कि पेल्याला पेला लावून गटारगंगा दाखवणारा मार्ग धरायचा?•••••• हे ज्याचं त्यानं ठरवायचं !

निसर्गाने दिलेले दोन दिवे•••• सूर्य आणि चंद्र! कालचा अंधार सूर्याच्या पहिल्या किरणाने निघून जातो आणि चंद्राच्या तेजाने अंधारही अंधार वाटत नाही म्हणून या दोन्ही दिव्यांचे आभार मानायचे•••• कि दिव्यांची गरजच नाही म्हणत स्वत: होऊन उजेड विरहित दरीत उडी मारायची ••••• हे ज्याचं त्यानं ठरवायचं ! 

पण मला वाटते दिवे जरी उजळत असले तरी त्यावर पण सारखे वापरून चिकटपणा घाण याचा थर जमा होत असतो. हे सगळे साफ करायला पाहिजेच म्हणजे येणारा प्रकाश काजळी विरहित प्रकाशणारी ज्योत ही अधिक तेजोमयी शांत होत असते.म्हणून देवापुढचे ,मनातले , ज्ञानाचे सारे दिवे आज धुवून लख्ख करूया आणि चांगले चकचकीत करून त्यात आशेचे तेल कर्तृत्वाची वात लाऊन हे दिप प्रज्वलीत करू या!

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ देवळाबाहेरचा विठ्ठल… ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

🌸 विविधा 🌸

☆ देवळाबाहेरचा विठ्ठल… ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

काल सकाळी सहज फेरफटका मारायला खाली उतरलो.. एक चक्कर संपूर्ण कॉलनी ला मारून, सकाळची हसरी आणि प्रसन्न शांतता अनुभवून, मध्येच सुरेल किलबिल पक्षांची एकुन आणि डोंगराच्या आड निवांत निद्रा घेणाऱ्या पण अवनी मातेला आपल्या तेजाने कृत्य कृत्य करण्यास आतुर असलेल्या सूर्याचे प्रथम दर्शन घेणे हा तसा तर माझा नित्य दिनक्रम..

प्रभात ऊर्जेचा हा श्वास संपूर्ण दिवसासाठी मला drive करणारा एक फॅक्टर आहे आणि हा कार्यक्रम गेली पंधरा वर्षे अखंड सुरू आहे..

आज ही ऊर्जा फेरी सकाळी सुरू झाली.. अगदी एखाद किलोमीटर वर असलेल्या विठ्ठलाच्या मंदिरापाशी मला थोडीशी गर्दी दिसली म्हणून मी ही घुटमळलो तेथे.. पाहिले तर सात वर्षाची एक चिमुरडी आपल्या दीड वर्षाच्या भावाला बाजूला घेऊन लता दिदींचे ‘ज्योती कलश छलके…’ गात होती..

कपडे बेताचेच.. घरची गरिबी प्रचंड असावी.. पण सुरांची सरस्वती मात्र तिच्यावर प्रसन्न होती.. तिच्या तेजस्वी रुपात आणि प्रतिभासंपन्न गळ्यात लक्ष्मी साक्षात उतरली होती.. तिचा तो दीड वर्षाचा भाऊ सुद्धा त्याच्या वयापेक्षा कितीतरी पटीची स्वभावातील परिपक्वता दाखवत होता.. शांतपणे आपल्या बहिणीची प्रतिभा तो ही कौतुकाने पाहत होता..

मला कळेना.. किती सुखद अनुभव.. माझी सकाळ सार्थकी लागली या आनंदात मी तिथेच रेंगाळू लागलो.. एका मागे एक सुरेल गीतांची ती मैफिल मला सोडायची च नव्हती.. मंत्रमुग्ध होऊन मी तिथेच थांबलो.. हळू हळू गर्दी ओसरली.. आणि आता मी एकटाच होतो.. काही वेळाने त्या गान सरस्वती ने गाणे थांबवले. मला अत्यंत आदराने नमस्कार करून आपल्या भावाला सोबत घेऊन निघायच्या तयारीत ती उठली खरी आणि मला काहीतरी दिसले.. तिच्या बाजूलाच तिने एका छोट्याश्या पाटीवर काही अक्षरे लिहिली होती.. ती पाटी वाचली आणि मी ही थबकलो..

‘मला शिकायचंय..’

दोनच शब्द.. पण माझे कुतूहल शिगेला पोचले.. आस्थेने तिची चौकशी केल्यावर मला कळले तीचे नाव कस्तुरी होते.. आणि तिच्या भावाचे प्रसन्न.. कस्तुरी चे बाबा संगीत विशारद होते आणि एका अपघातात त्यांना त्यांचे पाय गमवावे लागले होते.. तेव्हा पासून, म्हणजे साधारण वर्ष भरपासून ते घरीच असायचे.. घरची गरिबी सुरवातीपासूनच होती पण बाबांच्या अपघाताने ती दरिद्र्याकडे वळली.. आई घरकाम करून काहीतरी मिळवायची आणि जेमतेम खाता येईल इतकच हे कुटुंब कमवत होते. संस्कारा शिवाय हे दांपत्य आपल्या मुलांना अतिरिक्त काहीही देऊ शकत नव्हते.. त्यात कस्तुरी ला वर्षभरापूर्वी नाईलाजाने शाळा सोडावी लागली.. आणि याचे दुःख कस्तुरी च्या बोलण्यातून जाणवत होते. मला समजलंच नाही बोलता बोलता एक तास कसा संपला..

“काका मला निघायला हवे.. आई ला मदत करायची आहे..” असे म्हणून कस्तुरी, प्रसन्न ला अंगावर घेऊन लगबगीने निघाली.. ती पाटी मात्र माझ्या डोक्यातून काही निघत नव्हती.. ‘मला शिकायचंय..’

विचारांच्या चक्रातून मी बाहेर येतच नव्हतो.. माझ्या मुलीचे demands मला आठवू लागले. अमुक एक प्रकारचीच बॅग हवी म्हणून असलेला तिचा हट्ट, आणि तो पुरवण्यासाठी आम्हा उभयतांचा चाललेला आटापिटा.. सगळे डोळ्यासमोरून हटतच नव्हते.. 

मला शिकायचंय.. शिकण्यासाठी केव्हढी तपश्चर्या करावी लागतेय.. सकाळी उठून आपल्या दीड वर्षाच्या भावाला घेऊन गळ्यातल्या सरस्वतीचा आविष्कार इतरांना देऊन त्यात ही भीक न मागता फक्त एकच अपेक्षा, मला शिकायचंय..

खरंच मला जड होते का तिला शिकवणे?? असे किती पैसे लागतील??? महिना दोन ते तीन हजार ..जास्तीत जास्त.. मला खरंच फार नव्हती ही रक्कम.. पण द्यावे की नाही हा संभ्रम मात्र नक्कीच होता. कुटुंबाला घेऊन एकदा हॉटेलिंग करताना अतिशय मामुली वाटणारी रक्कम अचानक मला खूप मोठी वाटायला लागली.. कसे असते ना..

समाजासाठी आपण काही तरी करायला हवे हे स्वतःसह इतरांना मी आज पर्यंत हजारो वेळा सांगितलंय. पण मग आज जी गोष्ट मला शक्य आहे ते करताना मात्र माझा हात आणि मेंदू दोन्ही आखडले आहे.. लाज वाटली स्वतःची.. आणि एक निर्णय झाला..

दिवसभर मी कस्तुरी च्या admission साठी माझे सो कॉल्ड सगळे resources वापरले. तिच्या वडिलांना भेटलो.. कागदपत्रे घेतली आणि तिचे admission आमच्या विभागातील एका अत्यंत प्रतिष्ठित अशा शाळेत केले ..कस्तुरी आणि प्रसन्न यांच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेतली ती पुढे किती तरी वर्षे.. ते कुटुंब आमचे कधी झाले ते कळलंच नाही.. साधारण आठ एक वर्षांनी कस्तुरी ला तिच्या कुटुंबीयांसमवेत आपल्या गावी जावे लागले ते कायमचे…. हळू हळू संपर्क तुटला.. आणि कस्तुरी विस्मृतीत गेली..

परवा सहज टीव्ही लावला..आणि एका सुरेल आवाजाने अक्षरशः डोळ्यात पाणी आणलं.. reality show मध्ये एक तरुणी गाऊन झाली होती.. आणि अंतिम निकाल तिच्या बाजूने लागला.. संगीत क्षेत्रातले दिग्गज तीचे कौतुक करताना थकत नव्हते.. एका कॉर्पोरेट मध्ये अतिशय मोठ्या हुद्द्यावर काम करत असलेल्या या मुलीला जेव्हा विचारण्यात आले की “या यशाचे श्रेय कुणाला..” तर ती लगेच म्हणाली “विठ्ठला ला..”

म्हणजे..???

“होय त्या विठ्ठला ला ..त्या परमेश्वराला, जो मला त्या मंदिरात नाही तर मंदिरा बाहेर भेटला.. मला योग्य दिशेला जायचे होते पण काकांनी ती हिम्मत केली आणि मला शाळेत घातलं.. कदाचित त्यांनी केलेली ही मदत त्यांच्यासाठी खूप छोटी असेल आजही ..पण माझ्या आणि प्रसन्न च्या आयुष्याचं सोनं झाले.. काका आज जर तुम्ही मला ऐकत असाल तर हा पुरस्कार तुमचा आहे काका..”

माझ्या डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते.. कस्तुरी ने आज मला खूप मोठे केले.. पण मी खरंच काय केलेलं.. एक छोटीशी मदत ..आणि एक आयुष्य घडले.. स्वतचा अभिमान नव्हे पण बरे वाटले.. एव्हढे समाधान मी कधीच अनुभवले नव्हते.. हे मला आयुष्यभर पुरणार होते..

‘देवळाबाहेर चा विठ्ठल…’ माझ्या कायम लक्षात राहिला आणि माझ्या या नंतरच्या पंढरी चा शोध घेण्याचा निश्चय करून मी एका वेगळ्या अनुभूतीने झोपायला गेलो..

सकाळी मला सर्वात आधी देवळातल्या विठ्ठलाचे आभार मानायचे होते.. आणि प्रार्थना करायची होती, ‘तुझा छोटासा अंश माणुसकीचा सर्वांना दे.. मला दिलास काही वर्षांपूर्वी ..आणि जीवन काय हे मला कळले.. आणि देवळाबाहेरचे असे विठ्ठल बरेच होऊ देत.. कारण अशा बऱ्याच कस्तुरी ज्यांच्यात लक्ष्मी,सरस्वती आणि प्रतिभा उपजतच आहेत.. त्यांना या विठ्ठलाची गरज आहे.

संकलन : श्री माधव सावळे 

प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘हाव’…एक बांडगूळ..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ ‘हाव’…एक बांडगूळ..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

हाव.दिसायला दोन अक्षरी एक साधा शब्द,पण त्यात नकारात्मक अर्थांचे विविध छटांचे रंग ठासून भरलेले..!कांही हवं असणं आपण समजू शकतो,पण अंत नसलेलं ‘आणखी हवं’ ही उध्वस्ततेची सुरुवात ठरते.आणखी हवं असणं म्हणजे हव्यास.हव्यास म्हणजे विध्वंसाची ठिणगीच जणू.कारण कोणत्याही हव्यासाचं असणं परोपकारासाठी,जनसुखाय -जनहिताय कधीच नसतं.ते तसं असूच शकत नाही.ते असतं स्वत:साठी,..स्वार्थासाठी.!,म्हणूनहव्यासाची परिणती अर्थातच विनाश हेअपरिहार्यच.खरं तर विश्व निर्माण झालं तेव्हाच निसर्गनियमही अस्तित्वात आले.हे नियम निसर्गातले सर्व घटक काटेकोरपणे पाळत असतात.अपवाद फक्त माणसाचा. पैसा,पद,प्रतिष्ठा,सुख यांच्या हव्यासापायी निसर्गाचे सगळे नियम धाब्यावर बसवण्याच्या सुरुवातीचा पहिला क्षणच विनाशकाले विपरीत बुध्दी ठरला. आपलं जगण्याचं निसर्गाला अपेक्षितच नव्हे तर अभिप्रेतही असलेलं प्रयोजनच माणूस विसरुन गेला आणि विनाशाच्या दिशेने त्याचा प्रवास सुरु झाला.

निसर्गाने माणूस निर्माण केला आणि त्याला बुध्दीचं वरदान दिलं.त्या बुध्दीचा  सर्व निसर्गघटकांच्या हितासाठी त्याने योग्य उपयोग करणे अपेक्षित होते.पण हव्यासाच्या अतिरेकामुळे सुखासमाधानाच्या मृगजळामागे धावता धावता निसर्गानेच दिलेलं बुध्दीमत्तेचं कोलीत हातात घेऊन सर्वाना प्रकाश दाखवणे अपेक्षित असताना अतिरेकी हव्यासामुळे माणूस ते क़ोलीत घेऊन सगळा निसर्गच जाळत सुटलाय.

माणसाचं हे अनैसर्गिक जगणंच त्याला आज विनाशाच्या अखेरच्या वाटेवर घेऊन आलंय.

निसर्गाला अपेक्षित असणारं  माणसाचं ‘ जगणं’ हे एका अतिशय सुखी,समाधानी,समृध्द, सुंदर अशा जगाच्या निर्मितीला निमित्त झालं असतं. एरवी अगदी सहज वास्तवात येऊ शकलं असतं असं ते सुंदर जग आज माझ्या मनात मला स्वच्छ दिसतंय,पण..स्वप्नवतच. म्हणूनच ते रुखरूख वाढवणारं ठरतंय.काहीतरी निसटून गेल्याची रुखरुख. निसर्गाला अभिप्रेत असलेल्या त्या सुंदर जगाचं दर्शन   तुमच्याही मनात ती रुखरुख निर्माण करेल आणि कदाचित नव्या वाटा शोधण्याची असोशीही….!

कसं आहे हे हवंहवंस जग? हे जग आणि अर्थातंच इथलं जगणंही अतिशय निरामय आणि  सुंदर आहे. या जगात माणुसकी हा एकच धर्म अस्तित्वात आहे. ॐकार हाच प्रत्येकाचा देव आहे. घरं मंदिरासारखी पवित्र आहेत आणि त्या घरांऐवजी प्रत्येकाच्या मनामधे देव्हारे आहेत. त्या देव्हार्यात ॐकाराची पूजा नित्यनेमाने होते. नीतिनियमांनुसार आचार हे प्रत्येकाचे व्रत,आणि त्यातून मिळणारं समाधान हा पूजेचा प्रसाद..! निसर्गाचे सर्व नियम इथे सर्वानी मनापासून स्विकारलेत. त्यामुळे निसर्गालाही कृतकृत्य वाटतेय.त्यामुळे निसर्ग छान खुललाय. फुललाय. निसर्गचक्राचा स्वत:चा ताल,वेग सर्वांसाठीच हवाहवासा,आनंददायी ठरतो आहे.निसर्ग प्रसन्न आहे,त्यामुळे माणसेच नव्हे,तर मनुष्येतर प्राणीही अतिशय समाधानी आहेत.माणसांनी त्याना अभयारण्यांऐवजी अभयच देऊ केल्यामुळे मानवाचा अधिकार त्यानीही मनापासून स्विकारलाय आणि स्वत:च्या अरण्यकक्षेत ते आनंदाने जगतायत.माणसांचं नागरी जीवन त्यामुळे भयमुक्त आणि श्वासोच्छवासासारखं सहजसुंदर आहे.पृथ्वीच्या अंगाखांद्यावरचं जनसंख्येचं अतिरिक्त ओझं आता कमी झालंय.त्यामुळे पृथ्वीसुध्दा निरोगी आणि नीतिमान माणसांचं आस्तित्व अलंकारांसारखं मिरवतेय…!

या जगात प्रत्येकजण सुखी आहे आणि समाधानीही..!        

प्रत्येकाला स्वत:च्या कुटुंबाचं असं घर आहे.ते एकमजलीच आहे.घरापुढे प्रशस्त अंगण आहे आणि फुललेली हसरी बागही.त्या बागेतल्या गोड, रसाळ फळांसारखाच प्रत्येकाचा संसार आहे.

रस्तेआहेत आणि ते स्वच्छ,चकचकीत आहेत.पादचार्यांसाठी खास अभयरस्ते आहेत.वाहनांसाठी अर्थातच वहातुकीचे वेगळे रस्ते.त्यामुळे रस्त्यातून चालणं आणि वहान चालवणंही आनंददायी आणि निश्चिंत आहे.

एकमजली बैठ्या घरांमुळे सूर्यही प्रसन्न आहे.त्याच्या आनंदप्रकाशी किरणांतून पसरणार्या प्रकाशाची कोणत्याही अडसरावीना आता मुक्त उधळण होऊ शकतेय.त्यामुळे या वातावरणात भरुन राहिलेल्या सौरशक्तीवरच सर्व वाहने चालतायत.त्यामुळे संपूर्ण निसर्गच प्रदूषण,धुराचा वास,आणि सहवास यापासून पूर्णपणे मुक्त आहे.शाळा आहेतच,त्याना प्रशस्त पटांगणेही आहेत.घरांसारख्या शाळाही नैसर्गिक संस्कारकेंद्रे आहेत.मुलं फुलांसारखी सुंदर आहेत.त्याना शाळा घरांइतक्याच प्रिय आहेत..!

कौटुंबिक पार्श्वभूमीवर श्रमविभागणी आहे.नेमून दिलेली सर्व कामे प्रत्येकालाच आळीपाळीने करावी लागतात.तिथे स्त्री,पुरुष,मुलगा,मुलगी याऐवजी प्रत्येकाचा एक व्यक्ती म्हणूनच विचार होत असल्याने सर्वानाच सर्वप्रकारच्या कामांचं कौशल्य अंगी बाणवणं शक्य होतं.या जगात वृध्दांचं वार्धक्य तरुणांच्या निगराणीखाली कृतार्थ आहे..!इथे मरणही आहेच,आणि ते  जगण्याइतकंच सुंदरही आहे.कारण ते भयमुक्त आहे.निसर्गनियमांनुसार योग्यवेळी येणारा हा मृत्यू अट्टाहासाने कांहीही करून जगण्याचा हव्यास नसल्याने कृतार्थही आहे.आणि म्हणूनच पुन्हा सळसळत्या जीवनाचा उपभोग घेण्यासाठी टाकल्या जाणार्या कातीसारखि तो सहजसुंदर आहे.

हे स्वप्नवत वाटेल सगळं,पण हे वास्तवात उतरणं अशक्य नसणारं स्वप्न आहे.मात्र सर्व स्तरांवर फोफावलेल्या हव्यासांची बांडगुऴं हाच यातला एकमेव अडसर आहे..! त्या बांडगुळाचा नाश करायचा की फक्त जिवंत रहाण्यासाठी घुसमटत जगायचं या प्रश्नाचं योग्य उत्तर शोधता आलं, तरच स्वप्न आणि वास्तवातली सीमारेषा पुसली जाईल..!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘जागतिक विद्युत सुरक्षा दिन’ अर्थात ‘दीप अमावस्या‘ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

जागतिक विद्युत सुरक्षा दिन’ अर्थात ‘दीप अमावस्या‘ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

आषाढ महिन्याची अमावस्या !!!  या अमावस्येलाच ‘दिव्याची आवस’ किंवा ‘दीप अमावस्या’ असे म्हटले जाते. या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातले दिवे घासून-पुसून एकत्र मांडतात. त्याच्याभोवती रांगोळ्या काढतात व ते दिवे प्रज्ज्वलीत करुन त्यांची पूजा केली जाते. पूजेमध्ये पक्वान्नांचा महानैवैद्य दाखविला जातो. त्यावेळी पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात.

‘‘दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्‌।

गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥”

भावार्थ:-

‘‘हे दीपा, तू सूर्यरुप व अग्निरुप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.’’ 

कथा कहाण्या नेहमीच रम्य असतात. जनमानस सुद्धा कथा ऐकण्यास उत्सुक असते. *ज्याप्रमाणे मधाचे बोट लावून आई कडू औषध पाजते, अगदी त्याच मायेने आपल्या पूर्वसूरींनी जनमानसाचा अभ्यास करुन प्रत्येक आध्यात्मिक (खरंतर वैज्ञानिक) तत्व सामान्य मनुष्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आणि यातूनच विविध कहाण्यांची निर्मिती झाली. कहाणीच्या पुस्तकात ‘विविध सण’ आणि ‘व्रतवैकल्ये’ यांच्या मनोहर कहाण्या दिलेल्या आहेत. त्या कहाण्या सांगण्याचा मुख्य हेतू श्रद्धा वृद्धिंगत व्हावी आणि समाजाने नियम पाळावेत असा असावा. कारण तत्कालीन समाजपद्धतीत ‘धर्माने’ अथवा ‘शास्त्राने’ सांगितले आहे असे मानून तसे आचरण करणारी मंडळी पुष्कळ होती. 

भारतीय कालमापन पद्धतीप्रमाणे आषाढ महिन्याच्या शेवटी ग्रीष्म ऋतू संपतो. तसेच दुसऱ्या दिवशीपासून वर्षा ऋतूची सुरुवात होते. वर्षा ऋतू स्वाभाविकच जास्त पावसाचा. *पूर्वी विद्युत दिवे नव्हते, त्यामुळे प्रकाशासाठी दिव्यांची गरज होती. दिवा स्वच्छ असेल तर स्वाभाविक त्याचा जास्त प्रकाश पडणार. त्यानिमित्ताने घरातील सर्व दिव्यांची तपासणी (आपण त्यास आजच्या लौकिक भाषेत ‘ऑडिट’ म्हणू शकतो) व्हायची. पूर्वीच्या लोकांना आठवत असेल की कंदील, टूकं ( रॉकेल वर जळणार छोटा दिवा ), बत्ती असे विविध प्रकारचे दिवे असायचे. त्या दिव्यांची खूप निगा राखावी लागत असे, अन्यथा ऐनवेळी ते दिवे पेटत नसतं. यासाठी उजळणी म्हणून घरातील सर्व दिवे उजळले जायचे. श्रावण भाद्रपद हे दोन्ही महिने मुसळधार पावसाचे आणि तुफानी वादळाचे. त्यामुळे हवामान त्यामानाने थंड. अमावस्या म्हणजे काळोखी रात्र. घरात प्रकाश आणि पुरेशी ऊब मिळण्यासाठी दिव्यांची गरज असतेच. त्यामुळे दिव्यांची डागडुजी, स्वच्छता हा त्यामागील तांत्रिक भाग होता. आजच्या आधुनिक युगात संपूर्ण आषाढ महिना ‘विद्युत सुरक्षा मास’ म्हणून पाळावा असे सुचवावेसे वाटते. घरातील, कार्यालयातील सर्व वायरिंग , प्लग , सॉकेट, अर्थींग,  बटन्स, सर्व विद्युत उपकरणे आदि या महित्यात  तपासून  घ्यावीत, दिवे पुसून घ्यावेत. तसेच दुचाकी, चारचाकी वाहनाचे दिवे, इनव्हर्टर, जनरेटर आदींची आवश्यक ती निगा राखावी. या सर्वांचे  मूल्यमापन (तपासणी)  दीपअमावस्येला करावी.     

(कारण अमावस्या ही सर्वात जास्त काळोखी असते). विशेष करून घरातील गॅस शेगडी तसेच गॅसचा पाईप यांचीही तपासणी करावी कारण ‘स्वयंपाकघर सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित !!’ आजच्या भाषेत आपण त्यास जागतिक विद्युत सुरक्षा दिन’ म्हणू शकतो नव्हे तो होताच कारण हा ‘दिन’ संपूर्ण भारतात तितक्याच श्रद्धेने अनेक वर्षे पाळला जायचा आणि आजही पाळला जातो. मधल्या काळात आपण वैज्ञानिक  दृष्टिकोन विसरलो आणि आपल्या बऱ्याचशा सणांचा भावार्थ बदलला, तसेच त्याचा यथोचित अर्थ समाजास समजून सांगण्याची व्यवस्था आपण समाज म्हणून प्रस्थापित करण्यात अपयशी ठरलो, खरंतर तसा प्रयत्नच झाला नाही असे खेदाने नमूद करावेसे वाटते. ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून ‘वटपौर्णिमा’, ‘जागतिक विद्युत सुरक्षा दिन’ म्हणून ‘दीप अमावस्या’, ‘जागतिक कृतज्ञता दिन’ म्हणून ‘सर्वपित्री अमावस्या’, जागतिक आरोग्य दिन म्हणून धनत्रयोदशी (धन्वंतरी जयंती), महर्षी नारद जयंतीला ‘जागतिक पत्रकार दिन’ असे बरेच ‘दिन’ आपण साजरे करु शकतो. कारण या सर्व गोष्टींचा उगम भारतात झालेला आहे. गरज आहे ती फक्त इतिहासाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची!!.  आज आपण सर्वांनी प्रण करु की आजपासून ‘दीप अमावस्ये’च्या निमित्ताने घरातील ‘विद्युत सुरक्षा’ आवर्जून पाळली जाईल.   

आपल्या मागील सर्व पीडा (अर्थात गैरसमजुती, कोती वृत्ती) जाऊन जीवनात प्रकाश निर्माण व्हावा म्हणून या अमावस्येच्या दिवशी घरामधील सर्व दिव्यांचे पुजन केले जाते. पंच महाभूतांमधील अग्नि तत्वाची ही पूजा आहे. आपल्या पोटातील वैश्वानर नावाचा अग्नी अन्नपचनाचे काम करतो. शरीरातील अग्नीतत्व मंद झाले तर पोट बिघडते. याचाही विचार इथे होणे गरजेचे आहे. या दिवशी घरातील सर्व  पितळी दिवे, समया, निरांजने, तांब्याचे दिवे, लामणदिवे, कापूरवाती अश्या सर्वांची पूजा केली जाते. संध्याकाळी दिवेलागणीला ओटीवर गाईच्या शेणानं सारवायचे, रांगोळी काढून त्यावर पाट ठेवायचा. त्यावर सर्व दिवे ओळीने मांडून त्यांना हळदकुंकू, अक्षता, फुलं वाहायची. कणकेचे दिवे करायचे आणि मग त्यात साजुक तूप आणि कापसाची वात घालून सर्व दिवे पेटवून त्यांनी दिव्यांची आरती करून देवाला नैवेद्य दाखवयाचा. भारतीय संस्कृतीमध्ये दिवा, ज्योती, वात, फुलवात यांना महत्त्वाचे स्थान आहे. प्राणाला प्राणज्योत म्हणले जाते, दिवा व प्रकाश यांचे जीवनाशी नाते मानले जाते. सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी लक्ष्मी घरात येते व त्याचवेळी दारिद्र्याची देवता घरातून निघुन जाते अशी श्रद्धा आहे. यासाठीच घराघरात देवापाशी दिवा लावून शुभंकरोति, परवचा म्हणायची पद्धत होती. दिवस मावळतीकडे जातोय आणि रात्रीचा उदय होत असताना, या संधिकालात परमेश्वराचे नाव घेतले तर मनःस्थिती उत्तम राहण्यास मदत होते. मन प्रसन्न असेल तर स्वाभाविक जगही प्रसन्न असते, नाही का?

पूर्वी मुलाला कुळदीपक किंवा वंशाचा दिवा असे संबोधले जायचे किंवा रागाच्या भरात ‘किती दिवे लावलेस ते माहीत आहे’ असेही बोलले जात असे. अर्थात या बोलण्यातील मर्म असे आहे की मुलगा मुलगी कोणीही असो, त्याने घराण्याचे नाव आपल्या शुद्ध आचरणाने आणि कर्तृत्वाने उज्ज्वल करावे. *’उजेडात होते पुण्य, अंधारात पाप’ असे एक गीत आहे. मनुष्याने नेहमी उजेडातील कर्म करावीत असे ही दीप अमावस्या आपल्याला सुचविते असे म्हटले तर वावगे होणार नाही.*

भारतातील अनेक भागांमध्ये मोठमोठ्या गुहांमध्ये सुंदर चित्रकारी, नक्षीकाम पाहावयास मिळते. हे काम दिव्याशिवाय करणे शक्य नव्हते. भारतामध्ये दिव्याचा इतिहास खूप प्राचीन आहे. अग्नीचे प्राचीन काळापासून धर्मकर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. वेदांमध्ये अग्नीला देवतास्वरूप मानण्यात आले आहे. यामुळेच हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यापूर्वी देवासमोर दिवा लावला जातो. त्यामुळे वातावरण प्रसन्न होते. दिवा ज्ञान आणि प्रकाशाचे प्रतिक आहे. पूजेमध्ये दिव्याचे विशेष महत्त्व आहे. सामान्यतः विषम संख्येत दिवा प्रज्वलित करण्याची परंपरा आहे. दीप लावण्यामागचे कारण म्हणजे, आपण अज्ञानाचा अंधकार दूर करून जीवनात ज्ञानाच्या प्रकाशासाठी पुरुषार्थ करावा. हिंदू धर्मशास्त्रानुसार पूजा करताना दिवा लावणे अनिवार्य आहे. गायीच्या तुपाचा दिवा लावल्याने घरामध्ये सुख-समृद्धी येते. घरामध्ये स्थायी लक्ष्मीचा वास राहतो. गायीच्या तुपामध्ये रोगराई पसरवणारे सूक्ष्म किटाणू मारण्याची क्षमता असते. तूप जेव्हा दिव्यामध्ये अग्नीच्या संपर्कात येते तेव्हा वातावरण पवित्र आणि शुद्ध होते. यामुळे प्रदूषण दूर होते.  गायीच्या तुपाचा दिवा लावल्याने याचा संपूर्ण कुटुंबातील सदस्यांना फायदा होतो. ‘दीप प्रज्वलन’ हा घराला प्रदूषण मुक्त करण्याचा एक प्राचीन आणि प्रभावी उपाय आहे. 

दिवा लावतानाचा मंत्र:-

“दीपज्योति:परं ब्रह्म

दीपज्योति: जनार्दन:।

दीपो हरति मे पापं

संध्यादीप ! नमोऽस्तु ते।।”

दिवा लावण्याचे नियम: –

    • दिव्याची वात पूर्व दिशेकडे असल्यास आयुष्य वाढते.
    • दिव्याची वात पश्चिम दिशेकडे असल्यास दुःख वाढते.
    • दिव्याची वात उत्तर दिशेकडे असल्यास धनलाभ होतो.
    • दिव्याची वात चुकूनही दक्षिण दिशेकडे करू नये. यामुळे धन आणि जीवित हानी होऊ शकते.

दीप प्रज्वलन करण्यापूर्वी दीपाखाली अक्षता का ठेवाव्यात ? 

अक्षतांमध्ये असलेल्या पृथ्वी आणि आप तत्वाच्या कणांच्या प्राबल्यामुळे दीपाकडून प्रक्षेपित होणाऱ्या लहरी ग्रहण केल्या जातात अन् आवश्यकतेनुसार आपकणांच्या प्राबल्यावर त्या प्रवाही बनवून वातावरणात भूमीच्या दिशेने प्रक्षेपित केल्या जातात. या लहरी अधोगामी असल्याने त्यांची ओढ भूमीकडे असते, तर दीपातून प्रक्षेपित होणाऱ्या लहरींची ओढ आकाशाच्या दिशेने असते; कारण त्या ऊर्ध्वगामी दिशेने संचार करत असतात. अशा प्रकारे कार्यस्थळी दीपाच्या माध्यमातून वातावरणाच्या वरील पट्ट्यात सूक्ष्म-छत, तर अक्षतांच्या माध्यमातून भूमीवर सूक्ष्म-आच्छादन निर्माण होण्यास साहाय्य झाल्याने कालांतराने त्याचे रूपांतर घुमटाकार संरक्षक-कवचात होत असते. 

आषाढ महिना संपल्या नंतर श्रावण येतो आणि नंतर भाद्रपद या महिन्यामध्ये मद्यपान व मांसाहार वर्ज्य मानला जातो. म्हणून  यादिवशी काही लोकं अति प्रमाणात मांसाहार करतात. आज समाजात ही अमावस्या आज जरा ‘वेगळ्या’ कारणांसाठी प्रसिद्ध झालेली आहे. आज कोकणात तरी ती ‘गटारी अमावस्या’ म्हणून जास्त प्रसिद्ध आहे. सणांचे इतके विडंबन फक्त हिंदू धर्मातच होऊ शकते आणि ते फक्त ‘हिंदूच’ करु शकतात, यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते. धर्मांध असू नये याबाबत सर्वांचे एकमत होऊ शकेल पण धर्माभिमानीही असू नये हा दैवदुर्विलास नव्हे काय? आज आपल्या परंपरा, सण, व्रतवैकल्ये पुन्हा एकदा डोळसपणे समजून घेण्याची आणि समजून देण्याची नितांत गरज आहे अन्यथा पुढील पिढीला आपल्या विज्ञानाधिष्ठित संस्कृतीची माहिती होणार नाही.

उगवत्या सूर्याची पूजा करणारे आपण हिंदू लोकं आहोत. आपल्या  परंपरा, आचारविचार ह्या उजळवलेल्या दिव्यांच्या ज्योतीवर धरुन ‘पारखून’ घेऊ आणि तसे आचरण करण्याचा प्रयत्न करुया. प्रत्येक घरात जर असे ‘ज्ञानदीप’ लावले गेले तर आपला देश नक्कीच उजळून निघेल आणि त्या प्रकाशाने साऱ्या जगाचे डोळे दिपतील यात शंका नाही.*

शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा |

शत्रुबुद्धि विनाशाय दीपत्ज्योति नमोस्तुते ||

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गुरुपौर्णिमा…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

🌸 विविधा 🌸 

☆ “गुरुपौर्णिमा” ☆ सुश्री शीला पतकी 

मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू यांनी आपल्या भाषणात सांगितलेले हे वाक्य आहे ” शिक्षकानो लक्षात ठेवा कृष्णाला अष्टमी आहे रामाला नवमी आहे पण गुरूला मात्र पौर्णिमा आहे कारण तो पूर्ण आहे” त्याच्यावर समोरच्या विद्यार्थ्यांची अफाट श्रद्धा असते आणि मग भगवंता इतकीच आपल्यावर श्रद्धा असेल तर आपण परिपूर्ण होणे गरजेचे आहे त्यासाठी सर्व शिक्षकांनी गुरु पदापर्यंत पोहोचण्यासाठी ज्ञान वाढवले पाहिजे आपल्या विद्यार्थ्यांना विविध प्रकाराने ते दिले पाहिजे त्याचबरोबर त्याची आई होऊन त्याला संस्कार दिला पाहिजे बाप होऊन त्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे तर तो खरा परिपूर्ण शिक्षक

मित्र-मैत्रिणींनो परिपूर्ण कोणीच नसतो भगवंता शिवाय ..!आपण परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे काय तर आपल्या जवळ जे काही आहे ते ते समोरच्याला पूर्णत्वाने देणे आणि आपल्याजवळ जर काही कमी असेल तर ते पूर्णत्वाला येण्यासाठी सतत घेत राहणे. खरं तर आपला पहिला गुरु आई असते कारण ती आपल्यावर प्रेम करून प्रेमाने सर्व गोष्टी शिकवत असते आणि आपण त्या शिकत असतो पण ती सहज प्रक्रिया असते गुरुकडे जेव्हा तुम्ही शिकायला येता तेंव्हा जाणीवपूर्वक ज्ञान देण्याची प्रक्रिया सुरू होते त्यामुळे गुरूला वेगवेगळ्या भूमिकेतून जावे लागते अर्थात शिक्षकाला जर आपण  गुरु समजत असू तर त्याला वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात हे आधी जाणून घ्या. त्यानंतर तो ज्ञान देतोच माहिती देतो संस्कार पेरतो प्रोत्साहन देतो  चुका करायची संधी देतो कारण चुकल्याशिवाय चांगलं शिकता येत नाही. त्या चुका दुरुस्त करतो पाठीशी उभा राहतो आधाराचा हात कुठपर्यंत ठेवायचा आहे त्याला बरोबर कळतं तो उत्तमच समुदेशक असतो… अशा अनेक भूमिका शिक्षकाला कराव्या लागतात फक्त शिकवून  चालत नाही प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या असतो त्याला जाणून घेऊन त्याच्यावर काम करावे लागते त्याच्या समग्र कुटुंबाची माहिती घ्यावी लागते त्याची मानसिक अवस्था जाणून घ्यावी लागते त्याची सुख दुःखे जाणून घ्यावी लागतात. त्याच्या कमतरता जाणून घ्याव्या लागतात त्यात नेमकं काय कमी आहे ज्यामुळे तो पुढे जाऊ शकत नाही हे जाणून घ्यावे लागतं इतकं सगळं शिक्षक करत असतो. तो फक्त मराठी हिंदी त्याच भूगोल शिकवत नाही आणि हे सगळं करता आलं तर तुम्हाला गुरुपद मिळतं हे लक्षात ठेवा नाहीतर तुम्ही शिक्षक असता फक्त! अभ्यासाच्या गोष्टीचीच दखल घेणे इतकं काम शिक्षकाचा नसतं तर जीवनामध्ये त्याला काय अडचणी येतात आणि त्या त्यांनी कशा सोडवाव्या हे नकळत त्याला सांगावे लागते त्याच्या कमतरतांची जाणीव त्याच्या भावना न दुखावता करून द्यावी लागते हे सगळे शिक्षक का करू शकतो तर विद्यार्थ्याचे त्याच्याकडे शिकण्याचे जे वय असते ते कच्चे असते अद्यात त्याचा स्वतःचा विचार नसतो. जे आवडतं त्याच्यावरती तो भाळतो शिक्षक आवडले की त्याच्यावरती तो प्रेम करायला लागतो ते सांगतील ते त्याला करावसं वाटतं त्यांच्यासाठी काय पण.. ही वृत्ती निर्माण होते …मी असे अनेक विद्यार्थी पाहिलेत जे आपल्या शिक्षकावरती विलक्षण प्रेम करतात. … माझी एक विद्यार्थिनी होती तिला माझ्याबद्दल विलक्षण आकर्षण होतं. बाईने आपल्याला काम सांगावं.. बाईंच्या समोर आपण सतत राहावं.. बाईनी आपल्याला प्रश्न विचारावेत.. असं तिला नेहमी वाटत राहायचं ती आसपास घोटाळत राहायची तीला मी गणित विषय शिकवत होते त्यामध्ये साधारणपणे वर्गात विसाव्या नंबर पर्यंत तिचा नंबर असायचा पण मी जसं तिला वर्गात शिकवायला लागले तसं तिने माझ्यासाठी जोमान अभ्यास सुरू केला आणि मी वर्गात एकदा पेपर वाटण्यापूर्वी मुलींना विचारले होते कोणाला खात्री आहे की या परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क पडतील …पाच सहा विद्यार्थ्यांनी हात वर केला त्यात भीत भीत तीने हात वर केला सगळ्या मुली हसल्या कारण तिला आजवर तेवढे मार्क कधी पडले नव्हते आणि मी पेपर वाटले कमाल म्हणजे तिला एकटीला 30 पैकी 30 मार्क पडले होते सगळ्या मुली या चमत्काराने आश्चर्यचकित झाल्या कारण एकच होतं बाईंसाठी केलेला अभ्यास तोपर्यंत मलाही हे ठाऊक नव्हतं की ती माझ्यावरती एवढं प्रेम करते आज ती विद्यार्थिनी साठ वर्षापेक्षा अधिक आहे पण पुढे सातत्याने हा अभ्यास तीने टिकवला आणि मराठी विषयात विद्यापीठात पहिली आली एम ए झाली आपल्या राहत्या गावात संत चिंतन हे एक चॅनेल चालवत आहे आणि ती आजही कृतज्ञतेने मला सांगते बाई मी तुमच्यामुळे एवढी पुढे गेले किंवा तुमच्यामुळे माझ्यात हा बदल घडून आला खर तर मी काहीच केलं नाही फक्त पाठीवरती हात ठेवला…!

विद्यार्थ्यांची तुमच्यावर एवढी श्रद्धा असते की तुम्ही सांगाल ते प्रमाण वाक्य..! माझ्या वर्गातली एक विद्यार्थिनी आठवीमध्ये होती तेव्हा ती घरी जेवत नसे मधल्या सुट्टीत डबा नाही तिचे पालक येऊन मला भेटले आणि म्हणाले बाई खूप अभ्यासू हुशार आहे पण खात पीतच नाही सगळ्या डॉक्टराना दाखवून झाले पण काही उपयोग होत नाही खूप कृश होती मग मी तिला बोलावले आणि चौकशी केली आणि तिला सांगितलं की उद्यापासून डबा आणायचा व्यवस्थित डबा असला पाहिजे तो मैत्रिणींबरोबर बसून खायचा डब्यातला पहिला घास मी घेणार मला रोज डबा दाखवायचा आणि तो संपलेला ही मला दाखवायचा एका ग्रुप वर ही  जबाबदारीच टाकून दिली मी .मुली काय बाईने काम दिले म्हणजे चोख बजावणार दुसऱ्या दिवशीपासून तिने डबा आणायला सुरुवात केली मी एक घास घ्यायचा मग ती मुलींच्या घोळक्यात बसून डबा खायची आणि हळूहळू रोज ती डबा व्यवस्थित खायला लागली. तिची तब्येत पुढे चांगली झाली पुढे ती इंजिनियर झाली

 तिचे लग्न झाले तिच्या लग्नात तिच्या आई-वडिलांनी मला मुद्दाम घरी येऊन निमंत्रण केले होते आणि मी लग्नाला गेल्यानंतर भर मांडवात त्यांनी माझ्या हातात एक चार थाळी भरलेला डबा जावई आणि मुलींच्या हस्ते मला दिला आणि जावईबापूंना सांगितले की बाईंमुळे  आमची मुलगी जेवायला शिकली त्यामुळे आज तुम्हाला सुदृढ पत्नी मिळत आहे …आहे की नाही गंमत किती छोटी गोष्ट ही काय अभ्यासात नाहीये पण तिच्या आयुष्यासाठी ती अतिशय गरजेची होती आणि हे शिक्षकाला करावे लागते!

विद्यार्थ्याला प्रोत्साहन वेळेवर  मिळाले नाही तर त्याचे काय होते याची एक गोष्ट आहे एक मोठा चित्रकार गावात आला आणि त्याने आपला कार्यक्रम मोठ्या हॉलमध्ये भरवला चित्र कलेचे मार्गदर्शन केले त्यांची चित्रे फारच सुंदर होती त्यानंतर एक आजोबा त्यांना भेटायला गेले आणि त्यांनी काही चित्र त्यांना दाखवली एक अ संच होता अन एक ब संच होता चित्रकार म्हणाले अ संचातील चित्रे चांगली आहेत हा मुलगा खरं म्हणजे खूप मोठा चित्रकार होईल त्याला जरूर आपण चित्रकलेची जाणीव करून द्या आणि शिकवा ब संचातील चित्र जी आहेत ती मात्र अगदी टुकार आहे त्याने चित्रकला न शिकलेलीच बरी आजोबांना त्यांनी कुतूहल्याने विचारले कोणाची चित्रं आहेत तुमच्या नातवाची आहेत का? आजोबांनी उत्तर दिले नाही नाही अ संच जो आहे तो माझाच आहे पण मला शाळेत प्रोत्साहन मिळाले नाही त्यामुळे माझ्यातली कला वाढली नाही सुधारली नाही आणि ब संच्यातली चित्र आत्ता मी काढतोय ती आहेत तिची अवस्था अशी झाली आहे शाळेत मला वेळेवर प्रोत्साहन मिळाले असते तर कदाचित मीही आज तुमच्या जवळपास असलो असतो आजोबांच्या हातात असलेली चित्रकलेची कला केवळ प्रोत्साहन न मिळाल्यामुळे बहरू शकली नाही तेव्हा केवळ प्रोत्साहनने सुद्धा विद्यार्थी खूप काही काम करतात आणि ही किमया म्हणजेच पाठीवर हात ठेवणे.आदरणीय कुसुमाग्रजानी म्हंटले तेअगदी खरे आहे त्यांचा कणा ताठ  राहील अशी शिकवण देणे हे गुरुचे काम आहे आणि मग विद्यार्थी आपोआपच म्हणतो पाठीवर हात ठेवून नुसते लढ म्हणा

विद्यार्थी हा सुरुवातीला गुरुचे अनुकरण करत असतो आणि मग सुरुवात होते अनुकरणापासून अनुसरणापर्यंत! आपल्या पद्धतीने त्यांनी राहावं हा भाग वेगळा पण आपल्या पद्धतीने विचार करून आत्मविश्वासाने जगावे म्हणजे तुमचे अनुसरण करावे असे वाटत असेल तर शिक्षकाला फार सतर्कपणे वागावे लागते आणि आपल्या विद्यार्थ्यांसमोर खऱ्या अर्थाने आदर्श उभे करावे लागतात.आपल्या  वर्तनातून! आत्ताच्या विद्यार्थ्यांना पुस्तकातले शिकवलेले आदर्श फारसे पटत नाहीत पण समोर दिसणाऱ्या गोष्टी वरती मात्र त्याचा खूप विश्वास असतो आणि त्यातली पहिली व्यक्ती असते त्यांचे शिक्षक म्हणून शिक्षकांवर जबाबदारी आहे आपले वर्तन आपले विचार हे कोणीतरी अनुसरणार आहेत हे लक्षात ठेवून समाजात वागत राहा तर तुम्हाला गुरु पद मिळेल ते प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंतःकरणात असेल त्यासाठी त्यांचे फोन यावे लागतात मेसेजेस यायला लागतात असं अजिबात नाही भेटलेल्या प्रत्येक क्षणाला ते झटकन आपलं मस्तक तुमच्या पायावरती ठेवतात कारण आपण त्यांच श्रद्धास्थान असतो अशा पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांना घडवणारे असंख्य शिक्षक महाराष्ट्रात आहेत आम्हालाही ज्यांनी या पद्धतीने घडवलं त्यांचे आदर्श आमच्यासाठी मार्गदर्शक ठरले त्या असंख्य गुरूंना आजच्या दिवशी मनःपूर्वक नमन!

वाचक हो हा लेख वाचल्यानंतर आपल्यालाही आपल्या शिक्षकाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही त्यांनाच मनोमन नमस्कार करा आणि आजची गुरुपौर्णिमा साजरी करा सर्वांना पुनश्च एकदा गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रतिमा-भंजन ::: एक छंद – लेखक : श्री विश्वंभर चौधरी ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे  ☆

श्री सुनील देशपांडे

? विविधा ?

☆ प्रतिमा-भंजन ::: एक छंद – लेखक : श्री विश्वंभर चौधरी ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे 

नेमका बाबासाहेबांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी 13 एप्रिलला व्हाट्सअप युनिवर्सिटी आणि फेसबुकवर मेसेज येतो की घटनासमितीत शेकडो लोक होते मग घटनेचे शिल्पकार फक्त बाबासाहेब कसे? 

2 ऑक्टोबर तर सगळ्यांनी मुक्तपणे गांधीजींना शिव्या देण्याचा दिवस, गांधी कसे आणि कुठे चुकले यावर भरभरून लेख येतात.

14 नोव्हेंबर म्हणजे तर सगळ्यात मोठा शिमगा! नेहरूंवर खोटेनाटे आरोप लावण्याचा हक्काचा दिवस! नेहरू हे यात सगळ्यात दुर्दैवी. 

1 ऑगस्ट आला की ‘भटमान्य’ टिळक कसे सनातनी होते, फक्त ब्राह्मणांचे नेते होते… 

आता पहिल्या पिढीचा उद्धार करून संपल्यावर आपली तरुणाई दुसर्या पिढीला सुरूवात करत आहे. साने गुरुजींना काल फटका बसलाच.  पुन्हा, मी मीमवर बोलत नाही, प्रतिक्रियांवर बोलतोय. 

आणि मी सराईत ट्रोलाबद्दल म्हणजे अजेंडे घेऊन आणि त्या अजेंड्यासाठीचा पगार घेऊन लिहीणारांबद्दल बोलत नसून कोरी पाटी घेऊन सोशल मिडीयात आलेल्या आजच्या सर्वसामान्य तरुण पिढीबद्दल बोलत आहे. 

सगळेच तसे नाहीत पण बहुतांश तरूण हे फशी पडत आहेत. राष्ट्रीय नेत्यांबद्दल फेसबुकवरून मत बनवत आहेत. आणि तशा काॅमेंट धडाधड टाकत आहेत जे योग्य नाही.

माझ्या वाॅलवर सेक्युलॅरिझमला पाठिंबा देणारा एखादा तरूण दुसर्या कुठल्यातरी वाॅलवर कट्टर जातीयवादी प्रतिक्रिया लिहितांना मला आढळतो तेव्हा खरंच विश्वास बसत नाही की हा खरा की तो खरा? 

फेसबुकचा सगळ्यात वाईट भाग असा आहे की इथं प्रत्येक राष्ट्रीय नेत्याचं फक्त वैगुण्य शोधलं जातं आणि ते तिखट मीठ लावून सांगितलं जातं. 

रात्रीच्या अंधारात एखाद्या राष्ट्रपुरूषाच्या पुतळ्याची विटंबना करणारा आणि दिवसाच्या उजेडात फेसबुकवर राष्ट्रीय नेत्याचं प्रतिमाभंजन करणारा- कसा फरक करायचा दोघात? 

फक्त प्रतिमाभंजन. विधायक काहीच नाही. जणू काही या माणसांना देशानं आत्तापर्यंत डोक्यावर घेतलं ते केवळ  अज्ञानापोटी आणि या नव्या संशोधकांनी फेसबुकवर संशोधन केल्यामुळेच जगाला सत्यस्वरूप कळलं अन्यथा सगळं जग अंधारात होतं.

राष्ट्रीय नेत्यांची चिकित्सा व्हावीच. चिकित्सेला विरोध नाही. 

उद्या बाबासाहेबांच्या ‘प्राॅब्लेम ऑफ रूपी’ या प्रबंधात एखादं गृहीतक कसं चुकलं हे कोणी सप्रमाण मांडलं किंवा महात्मा फुलेंचा शेतीविषयक आर्थिक विचार कोणी खोडून दाखवला किंवा गांधीजींच्या सत्याग्रहातल्या उणीवा दाखवल्या किंवा नेहरूंच्या परराष्ट्र नीतीत चुका काढल्या किंवा टिळकांच्या गीतारहस्यामध्ये त्यांचं गीतेचं आकलनच मुळात कसं चुकलं हे मांडलत तर स्वागत आहे! मराठी समाज बौद्धिकदृष्ट्या जिवंत असल्याचं ते लक्षण असेल. पण भलतीच समीक्षा होतांना दिसतेय.    

काळाच्या मर्यादेत  त्यांनी शक्य तितके बदल घडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कामाची चर्चा करा. त्यांच्या योगदानाची चर्चा केली तर आपणही काही करावं असं वाटेल. त्यांचे फक्त तथाकथित दोष चघळत बसलो तर गावच्या पारावर वर्षानुवर्ष त्याच गप्पा मारत बसलेल्यांसारखी तुमची अवस्था होईल. ज्यांच्यावर तुम्ही टीका करता ते कधीच वर गेले. तुमच्या भविष्यात जर कशाचा उपयोग करता येईल तर तो त्यांच्या कामाचा. त्यांच्या चुकांचा काय उपयोग? 

प्रतिमाभंजनाच्या खेळातून बाहेर या, विधायक काम बघा. शक्य झालं तर ते पुढे न्या.   

मी सरसकटीकरण करत नाही. विधायक विचार करणारे पण आहेत पण संख्या अगदी नगण्य. आणि तरूण म्हणून तुमची प्रत्येक अभिव्यक्ती मला मान्य आहे, अभिव्यक्तीच पिढीगणिक बदललेलं वेगळेपणही मान्य आहे. फक्त अभिव्यक्ती हे साध्य नसून साधन आहे एवढंच सांगायचंय.

माझा कदाचित राग येईल तुम्हाला. येऊ द्या. मी कधीच गोड गोड उपदेशासाठी प्रसिद्ध नव्हतो. तुमची उमेदीची वर्ष, अभ्यासाची वर्ष या टिंगलटवाळीत वाया जाऊ नयेत. 

गांधी सनातनी होते, बाबासाहेब अहंकारी होते, नेहरू चारित्र्यहीन होते, टिळक फक्त भटमान्य होते या सगळ्या अफवा आहेत. अभ्यास वाढवला की डोक्यात प्रकाश पडेल.

या सगळ्यांच्या कामाचा अभ्यास करा, सोशल मिडीयानं आकसानं त्यांच्यावर लादलेल्या कथित दुर्गुणांचा अभ्यास करून काय होणार?

स्वातंत्र्यानंतरच्या दोन-तीन पिढ्यांनी चांगलं ते समोर ठेवलं. नव्या पिढीनं फक्त वाईटाचा शोध लावून ते झाकाळून टाकू नये.  ज्ञानात भर पडावी, अज्ञानापुढे ज्ञान संपून जाऊ नये. 

द्वेष हा फक्त राजकीय अजेंडा असतो, अभ्यासात द्वेषाला जागा नाही. द्वेष की अभ्यास यावर एकदा व्यक्तिगत निर्णय करायचा आहे.

लेखक :  विश्वंभर चौधरी

प्रस्तुती : सुनील देशपांडे 

पुणे, मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग १९ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १९ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- आईच्या बोलण्यातही तथ्य आहेच हे मला नाकारता येईना.खरंच.देवापुढे हात जोडून मनोमन संकल्प सोडताना माझ्या ध्यानीमनीही नव्हते की हा आपला बँकेतला जॉब आहे. तो ट्रान्सफरेबल आहे. कुठेही कधीही बदली होऊ शकेल. तेव्हा काय करायचं? बारा वर्षांचा दीर्घकाळ आपण याच परिसरात थोडेच रहाणार आहोत? पुढे नाही जमलं तर?’

या जर-तरच्या गुंत्यात मी फार काळ अडकून पडलो नाही. तरीही ही संकल्पसिद्धी सहज सोपी नाहीय याची प्रचिती मात्र पुढे प्रत्येक पावलावर मला येणार होतीच.)

पुढे चार-पाच महिने काहीच अडसर आला नाही. प्रत्येकवेळी पौर्णिमेला कधी पहाटे लवकर तर कधी ते जमलं नाही तर कितीही उशीर झाला तरी बँकेतली कामं आवरुन संध्याकाळनंतर उशिरा बँकेतून परस्पर नृ.वाडीला जायचं हे ठरुनच गेलं होतं.बसला पौर्णिमेदिवशी गर्दी असल्याने जातायेताचे दोन्ही प्रवास उभं राहूनच करावे लागायचे.पण त्या धावपळीचा कधी त्रास जाणवला नाही.तरीही मी पौर्णिमेच्या दिवशी पहाटे लवकर उठून आंघोळ-पूजा आवरायला लागल्याचे पाहून सुरुवातीला आईच मला समजवायची. म्हणायची,

“हे बघ,अगदी पौर्णिमेलाच जायला हवं हा अट्टाहास कशासाठी? पंचमीपर्यंत गेलं तरी चालतं. विनाकारण ओढ नको करत जाऊस.जे करशील ते तब्येत सांभाळून कर.ते महत्त्वाचं”

ती सांगायची त्यात तथ्य होतंच.पण अगदी जमणारच नसेल तर गोष्ट वेगळी असं मला वाटायचं.नाहीच जमलं तर पंचमीच्या आत जायचं आहेच की. पण ते अगदी अपरिहार्य असेल तेव्हाच.तो आपला हुकमाचा एक्का.जरुर पडली तरच वापरायचा. शक्यतो नाहीच.आपल्या सोयीसाठी म्हणून तर नाहीच नाही.’दर पौर्णिमेला मी दर्शनाला येईन’ असा संकल्प केलाय तर शक्यतो पौर्णिमेलाच जायचं हे मी ठरवूनच टाकलं होतं.शेवटी हातून सेवा घडवून घ्यायची की नाही ही ‘त्या’ची इच्छा हाच विचार मनात ठाम होता!

सगळं व्यवस्थित सुरु झालं होतं. पण…? जूनच्या पौर्णिमेचं दत्तदर्शन झालं आणि ध्यानीमनी नसताना १जुलैला अगदी अचानक मला ‘Designated post’ आॅफर करणारी,माझं ‘ब्रॅंच मॅनेजर’ म्हणून महाबळेश्वर ब्रॅंचला पोस्टींग झाल्याची आॅर्डर आली.तीही ताबडतोब रिलीव्ह होऊन ४ जुलैच्या आत  महाबळेश्वर  ब्रॅंचला हजर होण्याचा आदेश देणारी!

वरवर पहाता खूप आनंदाने साजरी करावी अशी ही घटना होती. राष्ट्रीयकृत बँकांच्या नियमानुसार यापुढील प्रमोशन्ससाठी किमान एक टर्म रुलर ब्रॅंचला काम करणं अपरिहार्य होतंच.अनेकजण अतिशय गैरसोयीच्या खेडेगावी पोस्टिंग झाल्याने सर्वार्थाने खचून गेल्यामुळे जाॅब सॅटीस्फेक्शन अभावी नैराश्याने ग्रासलेले असायचे. या पार्श्वभूमीवर मला रुलर पोस्टिंग मिळालं होतं ते महाबळेश्वरसारख्या हिल स्टेशनवरच्या ब्रॅंचमधलं! हे आॅफीसमधे सर्वांच्याच कौतुकाचा विषयही ठरलं होतंच. पण ते आनंददायी असलं तरी त्या क्षणापर्यंतचं माझं शिस्तबध्दपणे सुरु असलेलं एकमार्गी रुटीन मात्र या घटनेने पूर्णत: ढवळून निघालं. कारण ही आकस्मिक घटना त्या क्षणापुरतीतरी माझ्यासाठी असंख्य प्रश्न निर्माण करणारीच ठरली होती. मनात गर्दी करुन राहिलेल्या त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात पुढचे दोन तीन दिवस कापरासारखे उडून गेले.

माझा मुलगा सलिल तेव्हा चार वर्षांचा होता.तो बालवाडीत जायला लागल्याने आरतीने, माझ्या पत्नीने,एम.ए.नंतर लगेच करता न आलेलं, खूप दिवस मनात असलेलं बी.एड्. करण्यासाठी काॅलेजला अॅडमिशन घेतलेली होती.प्रश्न एक वर्षाचाच होता पण त्यात ही ट्रान्स्फर आॅर्डर आलेली.तिच्या मनातली अस्वस्थता पाहून कांहीतरी ठाम निर्णय मलाच घ्यावा लागणार होता.

“हे बघ,तुला मेरीटवर गव्हर्मेंट काॅलेजमधे अॅडमिशन मिळालीय ना?मग तात्पुरत्या अडचणींचा विचार करुन माघार घेऊ नको.वर्षभर मी तिकडे एकटा राहीन.इथलं सगळं योग्य नियोजन करुन कसं निभवायचं ते शांतपणे विचार करुन ठरवूया.”

तिला दिलासा द्यायला माझे शब्द पुरेसे होते.पण तरीही..

” तिथं तुमच्या जेवणाचं काय ?तब्येतीची हेळसांड होईल ती वेगळीच.नकोच ते.”

“माझं काय करायचं ते तिथं गेल्यानंतर परिस्थिती पाहून ठरवता येईल.आणि तसंही तिथल्या धुवांधार पावसाचा विचार करता पावसाळा संपेपर्यंत तरी आपल्याला कोल्हापूरहून शिफ्टिंग करता येणार नाहीच. तोवर तुझी पहिली टर्म पूर्ण होत आलेली असेल.मग दुसऱ्या टर्मपुरताच तर प्रश्न राहील.थोडा त्रास होईल पण निभेल सगळं.”   

ठामपणे निर्णय घेतला खरा पण तो निभवायचा कसा हा यक्षप्रश्न माझ्यापुढे ‘आ’ वासून उभा होताच.हेच उलटसुलट विचार मनात घेऊन ४ जुलैला जुजबी सामान सोबत घेऊन मी पहाटेच्या महाबळेश्वर बसमधे चढलो.बस सुरु झाली,घराबरोबर गावही मागं पडलं.तेच एकटेपण मनात घेऊन श्रांतपणे मान मागे टेकवून अलगद डोळे मिटणार तेवढ्यात कंडक्टर तिकिटासाठी आलाच.मी खिशातून पाकीट काढून पैसे दिले.त्यानं दिलेलं तिकीट न् सुटे पैसे पाकीटात ठेवत असतानाच आत निगुतीने ठेवलेला,बाबांनी मला कधीकाळी दिलेला ‘तो’ दत्ताचा फोटो मला दिसला न् मी दचकून भानावर आलो.गेले दोन -तीन दिवस मला गुंतवून ठेवणाऱ्या सगळ्या व्यवधानांत मी माझ्या दर पौर्णिमेला दत्तदर्शनासाठी नृ.वाडीला जायच्या संकल्पाचा विचार कुठंतरी हरवूनच बसलो होतो याची आठवण त्या फोटोनेच करुन दिली आणि त्याच संकल्पाचा विचार एक प्रश्न बनून मनाला टोचणी देत राहीला. खरंतर हा प्रश्न तातडीचा नव्हता. जुलैमधल्या पौर्णिमेला अजून किमान तीन आठवडे बाकी होते.पण तरीही..? हे दर महिन्याला नित्यनेमाने तिथून नृ.वाडीला येणं आपल्याला जमेल? मनातले इतर सगळे प्रश्न,सगळ्या विवंचना,नवीन ब्रॅंच कशी असेल,तिथला स्टाफ कसा असेल या विचारांचं उत्सुकतेत लपलेलं दडपण हे सगळं दूर सारत पौर्णिमेच्या नित्यनेमाबद्दलचा ‘हे निर्विघ्नपणे पार पडेल?’ हाच प्रश्न मनात ठाण मांडून बसला.मग पूर्ण प्रवासभर मनात त्यासंबंधीचेच विचार.

महाबळेश्वरपासून नृ.वाडी पर्यंतचं अंतर (त्याकाळी) साधारण सात-साडेसात तासांचं होतं.जातायेताचे पंधरा तास लागणार असतील,तर  पौर्णिमेलाच जायचा अट्टाहास चालणार कसा? पौर्णिमा कांही रविवारीच नसणाराय.मग? असू  दे.जमेल तितके दिवस यायचंच हे पक्कं ठरवूनच टाकलं.त्याच क्षणी ते कसं जमवायचं याचे विचार सुरु झाले.त्यासाठी ‘जे जे करावं लागेल ते ते कर्तव्य न् जबाबदाऱ्या यांच्याबाबतीत कोणतीही तडजोड न करता करायचं ‘ हा निर्धार पक्का झाला.ते कसं करायचं ते पुढचं पुढं.अशा मगळ्या उलटसुलट विचारांच्या गुंत्यात महाबळेश्वर स्टॅन्ड कधी आलं ते मलाच समजलं नाही. सगळं सामान कसंबसं एका हातात घेऊन आणि दुसऱ्या हातात लहान बॅगेसोबतच जमेल तशी छत्री धरायचा प्रयत्न करीत मी बसच्या पायऱ्या उतरू लागणार तेवढ्यात तिथेच थबकलो.कारण समोर माझ्या स्वागतालाच आल्यासारखा प्रपाताप्रमाणे  कोसळणारा अखंड पाऊस माझ्याकडे पाहून जणू विकट हास्य करीत माझी वाट अडवून ओसंडत होता. माझ्याइतकीच हतबल झालेली सोबतची छत्री न् सामान कसंबसं सावरत मी त्या भयावह धुवांधार प्रपाताला सामोरा गेलो ते  मनातल्या ‘त्या’च्या विचाराचं बोट घट्ट धरुनच!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares