मराठी साहित्य – विविधा ☆ “वाद, वितंड आणि चर्चा…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “वाद, वितंड आणि चर्चा…☆ श्री जगदीश काबरे ☆

जगातील कोणत्याही दोन व्यक्ती या कधीच पूर्णपणे एकमताच्या असू शकत नाहीत–अगदी नवराबायकोही कितीही एकमेकांच्या जवळ असले तरीसुद्धा त्यांच्यात मतभिन्नता असतेच. मतभिन्नता असणे हे खरे तर जिवंत मनाचे लक्षण आहे. त्यामुळे दोन विचारी माणसे एकमेकात वादसंवाद करू शकतात; तर दोन अविचारी माणसे मात्र फक्त वितंडवाद घालू शकतात. पण विचारी माणसाचा अहं जेव्हा त्याच्या बुद्धीप्रामण्यावर हवी होतो तेव्हा मात्र समोरच्या माणसाने त्याची एखादी क्षुल्लक चूक दाखवली तरी त्याचा अहं दुखावतो आणि मग तो चूक कबूल करण्याच्या ऐवजी त्या चुकीचे समर्थन करायचा प्रयत्न करताना बेताल होत जातो. ‘समोरचा माणूस आपल्या चुका काढतो म्हणजे काय!’, असा अहंकार त्याला बेताल होण्यास भाग पाडतो. खरे तर असे लहानसहान वाद तात्पुरत्या स्वरूपातील असायला हवेत. हे वाद कानाआड करून पुन्हा नव्याने एकमेकांशी नितळ मनाने आपण संवाद साधायला हवा. पण आपल्या मनात मात्र त्या माणसाविषयी आकस ठेवणारा दृष्टिकोन निर्माण होतो आणि भविष्यात त्याच्याशी वागताना याच चष्म्याने त्याच्याकडे बघत आपण बोलत राहतो.

म्हणून मला असे वाटते की, निदान चळवळीतील कार्यकर्त्यांनी तरी अहंकाराला आपल्या बुद्धीप्रामण्यावर विजय मिळवून देऊ नये. जसे नवराबायकोमध्ये लहानसहान वाद होतात म्हणून ते लगेच घटस्फोटावर जात नाहीत, तसेच चळवळीच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा आपसातील लहानसहान वादांमुळे एकमेकांना शत्रू न मानता आणि मनभेद न करता मतभेद खुल्या मनाने स्वीकारले पाहिजेत. म्हणूनच म्हटले आहे की, ‘वादे वादे जाय ते तत्त्वबोध:’ पण हे केव्हा शक्य होईल, तर वादांकडे आपण मन प्रगल्भ करणारी चर्चा म्हणून पाहू तेव्हाच. पण वादाकडे जर आपण आपला अपमान करणारे शब्द समजायला लागू तर मात्र वाद हे चर्चा न ठरता हारजीतीच्या खेळावर उतरतात आणि त्यांचे वितंडात रूपांतर होते. ज्या वेळेला माणसाला प्रश्न पडत नाहीत, शंका निर्माण होत नाहीत आणि फक्त आदेश पाळणे, आज्ञाधारकपणा हा गुण समजला जातो त्या वेळेला मात्र कुठलाही वाद होण्याची शक्यता नसते. कारण अशी माणसे फक्त यंत्रमानवासारखी असंवेदनाशील सांगकामे असतात. पण विचारी माणसे संवेदनाशील असल्यामुळे सतत प्रश्न विचारत राहतात, शंका उपस्थित करतात म्हणून त्यांच्यात सतत वादविवाद होत असतात. हे वादविवाद माणसाला नवीन काही शिकण्यास आणि प्रगत होण्यास मदत करणारे असायला हवेत, असे वाटत असेल तर अहंकाराला आपल्या काबूत ठेवायला हवे. अन्यथा आज्ञाधारक मेंढरू आणि आपण यात फरक तो काय?

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गीता जशी समजली तशी… – गीतेचे वैशिष्ट्य – भाग – ३ ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

 

☆ गीता जशी समजली तशी… – गीतेचे वैशिष्ट्य – भाग – ३ ☆ सौ शालिनी जोशी

गीतेचे वैशिष्ट्य

पारंपारिक शब्दाना नवीन अर्थ देणे हे गीतेचे एक विशिष्ट्य आहे.

१) धर्म — येथे धर्म म्हणजे हिंदू, बौद्ध, जैन इत्यादी धर्म असा अर्थ नाही. यांना धर्म पेक्षा संप्रदाय म्हणणे योग्य. धर्म या शब्दाचे अनेक अर्थ आहेत.’धृ- धारयति इति धर्म:l’ धर्म म्हणजे समाजाची तर धारणा करणारा विचार किंवा कर्म . धर्म म्हणजे मार्ग किंवा सहज स्वभाव किंवा कायदा, नियम. तसेच धर्म म्हणजे कर्तव्य. तोच अर्थ गीतेला अपेक्षित आहे. त्यालाच गीता स्वधर्म म्हणते. प्रत्येक माणसाचा त्या त्या वेळचा स्वधर्म असतो. त्या त्यावेळी तो करणे कर्तव्य असते. उदाहरणार्थ पित्रुधर्म, क्षत्रिय धर्म, या दृष्टीने आई-वडिलांचे सेवा करणे हा मुलांचा तर मुलांचे पालन करणे त्यावेळेचा आईचा धर्म असतो.आणि राष्ट्रप्रेम हा प्रत्येक नागरिकाचा धर्म.प्रजा रक्षण हा अर्जुन क्षत्रिय होता म्हणून त्याचा धर्म होता. म्हणून गीतेच्या दृष्टीने स्वतःचे कर्तव्य म्हणजेच स्वधर्म .

२) यज्ञ– यज्ञ म्हटले की समोर येते आणि कुंड, तूप, समिधा इत्यादी साहित्य आणि हवन, स्वाहाकार अशा क्रिया. पण गीतेच्या दृष्टीने ममता व आसक्ती रहित असलेले, सर्व काळी सर्वांच्या कल्याणासाठी केलेले कर्म हाच यज्ञ. ‘इदं न मम’ या भावनेने केलेले कर्म हाच यज्ञ. यज्ञात आहुती देताना त्याच्यावरचा हक्क सोडून ते देवतेला अर्पण केले जाते. कर्माचे बाबतीत आसक्ती व ममता सोडून ईश्वरार्पण बुद्धीने केकेले कर्म हाच यज्ञ. मग अन्नपदार्थाबाबत अनासक्तीने केलेले अन्नग्रहण हे यज्ञ कर्मच, ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म’.असा हा निस्वार्थ कार्याला प्रतिष्ठा मिळवून देणारा यज्ञ.

३) पुजा– येथे पुजेसाठी हळद-कुंकू, फुले, निरांजन, नैवेद्य, पाणी कशाचीच गरज नाही. ही पूजा स्वकर्मानी करायची आहे. गीता म्हणते, ‘स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदति मानव:l ‘शास्त्रविधिने नेमून दिलेले कर्म कर्ता भाव सोडून भगवंताला अर्पण करणे म्हणजेच कर्माने भगवंताची पूजा करणे.म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात तुझ्या सर्व क्रिया, खाणे, दान, तप सर्व कर्तुत्वभाव सोडून माझ्यासाठी कर. हीच पूजा, येथे पान, फुल, फळ कशाची गरज नाही. अशी ही शुद्ध कर्माने केलेली पूजा गीतेला अपेक्षित आहे. कर्म हे साध्य नसून ईश्वराची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याचे साधन आहे. ईश्वरावर जो प्रेम करतो त्याची सर्व कर्मे पुजारूपच होतात.

४) संन्यास — गीता म्हणते, ‘ज्ञेय:स नित्य संन्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षतिl’ जो कोणाचा द्वेष करत नाही, कशाची इच्छा करीत नाही तो नित्य संन्याशीच जाणावा. म्हणजे गीतेला अपेक्षित असलेल्या संन्यास हा घरदार सोडून वनात जाण्याचा आश्रम संन्यास किंवा भगवी वस्त्रे घालून यज्ञादि कर्माचा त्याग करण्याचा नाही. हा वृत्ती संन्यास आहे. त्यासाठी वासना कामनांचा, फलाशेचा त्याग अपेक्षित आहे. निष्क्रिय होणे नाही. हा बुद्धीत आहे. कर्म सोडणे या बाह्यक्रियेत नाही. गीतेचा संन्यास हा कर्माचा नसून मी, माझे पणाचा आहे. कर्तुत्वमद आणि फलेच्छा टाकण्याचा आहे. असा संन्यासी लोकसंग्रहासाठी कार्य करतो. घरात राहूनही हा साधणे शक्य आहे.

५) अव्यभिचारी भक्ती– भक्ती म्हणजे भगवंताविषयी प्रेम, त्याची पूजा, नामस्मरण, प्रदक्षिणा करणे एवढा मर्यादित अर्थ नाही. ही भक्ती स्थळ, काळ, प्रकार यांनी मर्यादित आहे. ती संपते व सुरू होते. स्वकर्म आणि कर्मफळ त्या सर्वात्मकाला अर्पण करणे हीच भक्ती. विश्वाच्या रूपाने श्रीहरीच नटला आहे हे जाणून आपल्या सकट सर्व ठिकाणी त्याला पाहणे हेच अव्यभिचारी भक्ती. तेव्हा प्रत्येक वस्तूत, व्यक्तीत भगवंत आहे हा अभेदभाव पटला की प्रत्येक व्यवहार हा भगवंताशीच होतो.’ जे जे देखे भूतl ते ते भगवंत’l हा भाव हीच ईश्वर भक्ती. अशा प्रकारे भक्तीचे व्यापक रूप जे विहितकर्मातून साध्य होते ते गीता दाखवते. प्रत्येकांत देव पाहून केलेला व्यवहार शुद्ध होतो. व्यवहार व भक्ती दोन्ही एकच होतात.

६) अकर्म– व्यवहारात आपण सत्य -असत्य, धर्म -अधर्म या विरोधी अर्थाच्या जोड्या म्हणतो. त्या दृष्टीने कर्म -अकर्म ही जोडी नाही. अकर्म म्हणजे म्हणजे कर्म न करणे नव्हे, तर सामान्य कर्मच यावेळी निरपेक्ष बुद्धीने फलाची अपेक्षा न ठेवता कोणताही स्वार्थ न ठेवता, ईश्वरार्पण पद्धतीने केले जाते.त्यावेळी ते फळ द्यायला शिल्लक राहत नाही. करून न केल्यासारखे होते. त्यालाच अकर्म म्हणतात. म्हणजे इंद्रियांच्या दृष्टीने कर्म होते पण फळाचे दृष्टीने ते अकर्म. कर्माशिवाय माणूस एक क्षणभरही राहू शकत नाही. अशावेळी स्वस्थ बसणे हे ही कर्म होते. म्हणून निष्काम, सात्विक कर्म म्हणजेच अकर्म. थोर लोकांचे कर्म अकर्मच असते. लोकांना ते कर्म करतात असे वाटत असले तरी फलेच्छा व कर्तृत्व भाव नाही आणि लोकहिताचा उद्देश. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने फल रहित बंधरहित क्रिया म्हणून अकर्म.

७) समाधि– गीतेतील समाधी व्यवहारातील समाधी पेक्षा वेगळी आहे. व्यवहारात साधू पुरुषांना गतप्राण झाल्यावर खड्ड्यात पुरतात त्याला समाधी म्हणतात. गीता समाधी सांगते ती कर्म करत असतानाच प्राप्त होते .कर्म होत असतानाही आत्मस्थितीचे समत्व बिघडत नाही. बुद्धी स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते. तेव्हाची योगस्थिती म्हणजे परमेश्वराशी ऐक्य तीच समाधी. अष्टांग योगातील शेवटची पायरी ही समाधी. अशाप्रकारे नेहमीच्या व्यवहारातील धर्म, यज्ञ, पूजा, संन्यास, समाधी, भक्ती, अकर्म या शब्दाला वेगळे अर्थ देऊन गीतेने क्रांतीच केली आहे. येथे कोणतेही कर्मकांड नाही. श्रद्धा एकमेव परमात्म्यावर. या सर्व क्रिया कोणत्याही भौतिक साधनाशिवाय केवळ कर्मातून साध्य होतात. हे दाखवणे हेच गीतेचे वैशिष्ट्य. १८व्या अध्यायात भगवंत सांगतात, ‘ स्वे स्वे कर्मण्यभिरत:संसिद्धि लभते नर:l’ विहित कर्म तत्परतेने व उत्कृष्टपणे केल्याने साधकाला आत्मसिद्धी प्राप्त होते. अशाप्रकारे गीता हे आचरण शास्त्र आहे. आचरण्याची वेगळी वाट दाखवते.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सिंहावलोकन… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

सुश्री अपर्णा परांजपे

🌳 विविधा 🌳

☆ ✍️ सिंहावलोकन… ☆ सुश्री अपर्णा परांजपे

वर्षे येतील व जातील हे कालचक्र आहे. होते आहे व रहाणार आहे यात आपल्याला काय गवसलं हे महत्त्वाचे आहे.

प्रयत्नाचे फळ निश्चित मिळते. प्रयत्न विचार व‌ कृतीतून घडतात‌. इच्छित फळ मिळाले तर आनंदी आनंद पण नाही मिळाले तर निराशा, दुःख! फळाच्या परिणामाची शाश्वती नाही. व आनंद जरी मिळाला तरी तो टिकणारा असत नाही त्यामुळे खरे समाधान मिळणे ही आजच्या क्षणाची आवश्यकता ओळखून निश्चय करणे हाच काळावर मिळवलेला विजय असतो‌, अन्य कोणताही उपाय नाही.

प्रयत्न करणे व ते करत असतांनाच आनंद घेणे हा वेळेचा सदुपयोग आहे. येणारा परिणाम दुय्यम स्थानी ठेवल्यास त्यातून मिळणाऱ्या आनंदाचा  किंवा दु:खाचा परिणाम मनावर होणार नाही. सततच समाधान उपभोगता येईल हे जाणवणे म्हणजे स्थिरता प्राप्त होणे आहे.

*

“विचाराइतके देखणे काहीच नाही”

“एक दाणा पेरता मेदिनी माजी कणीस होते”..

*

✍️तो माझा अन् मी त्याची  दुग्धशर्करा योगच हा

मनी वसे ते स्वप्नी दिसे भगवंताचा खेळच हा…

*

“सोहम् सोहम्” शिकवून मजला धाडियले या जगतात

“कोहम् कोहम्” म्हणोनी अडलो उगाच मायापाशात..

*

अंतर्चक्षू प्रदान करुनी रूप दाविले हृदयात

कमलपत्र निर्लेप जसे नांदत असते तीर्थात..

*

सुखदुःखाची जाणीव हरली, ईश्वर चरणी भाव जसा

तसेच भेटे रुप तयाचे,गजेंद्राशी विष्णू तसा …

*

महाजन, साधूळ संत सज्जन काय वेगळे असे तिथे?

प्रेमाची पूर्तता व्हावी, हे ध्येय निश्चित तिथे…

*

“ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः”।

वचन तुझे रे अनुभव घ्यावा, हीच आस रे तुझी पहा…

*

निजानंदी रंगलो मी तव हृदयाशी भेटता

आतच होता,आहे,असशी जाणीव याची तू देता…

*

कृतार्थ मी अन् कृतार्थ तू ही जन्माचा या अर्थ खरा

आनंदाचा कंद खरा तू (मम)हृदयाचा आराम खरा…

*

कृष्ण सखा तू, रामसखा तू प्रेमाचा अवतार सख्या

अयोनिसंभव बीज अंकुरे सात्विक, शुध्द हृदयी सख्या..

*

प्रशांत निद्रा प्रशांत जीवन देहात पावले मज नाथा

प्राणांवर अधिराज्य तुझे रे केशव देतो (जसा)प्रिय पार्था…

*

आदीशक्ती अंबाबाई शक्तिरुपाने वसे इथे

त्याच शक्ती ने जाणीव होते भगवंत असे जेथे…

*

भगवंत हृदयस्थ आहे 🙏

© सुश्री अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ३८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ३८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

२ ) विविधा — ( लेख श्री. पंडित पाठवणार आहेत. )

“ तो आणि मी.. “ – भाग ३८ लेखक : अरविंद लिमये

तो आणि मी

 ——-(अरविंद लिमये, सांगली)

 (क्रमश:-दर गुरुवारी)

 भाग-३८

 ————————–

(पूर्वसूत्र- तो प्रसंग लिलाताईच्या दत्तगुरुंवरील श्रध्देची कसोटी पहाणारा ठरला होता आणि माझ्या बाबांकडून तिच्या विचारांना अकल्पित मिळालेल्या योग्य दिशेमुळे ती त्या कसोटीला उतरलीही!

तो दिवस आणि ती घटना दोन्हीही माझ्या मनातील लिलाताईच्या संदर्भातील आठवणींचा अविभाज्य भाग बनून गेलेले आहेत!)

आदल्या दिवशीच्या रात्री घडलेली ती घटना! त्या कॉलनीतली आमची घरं म्हणजे मधे भिंत असलेली दोन जोडघरेच होती.

त्या रात्री निजानीज होऊन बराच वेळ झाल्यानंतर अचानक मी पलिकडून येणाऱ्या जोरजोरात बोलण्याच्या आवाजाने दचकून जागा झालो. पाहिलं तर आई-बाबाही उठून बसलेले. हलक्या आवाजात एकमेकाशी कांहीतरी बोलत होते. इतर भावंडेही झोप चाळवल्याने माझ्या आधीच जागी झाली होती. रडत, मोठ्या आवाजात बोलण्याचा पलीकडून येणारा तो आवाज लिलाताईचा होता! ती तिच्या वडलांना दुखावलेल्या, चिडलेल्या आवाजात ताडताड बोलत होती. बाकी सर्वजण गप्प राहून ऐकत असणार कारण बाकी कुणाचाच आवाज येत नव्हता.

बाबांनी दटावून आम्हाला झोपण्यास सांगितले. ते दोघे मात्र नंतर बराच वेळ जागे असणार नक्कीच.

सकाळी उठलो तसं मी हे सगळं विसरूनही गेलो होतो. पण ते तात्पुरतंच. कारण बाबांनी पादुकांची पूजा आवरली तसं नेहमीप्रमाणे तीर्थप्रसाद घेण्यासाठी बाहेर आलेल्या

लीलाताईने हात पुढे केला तेव्हा तिला प्रसाद न देताच बाबा आत निघून आले आणि त्यामुळे दुखावलेली लिलाताई रात्री घडलेल्या प्रसंगाची पुन्हा आठवण करुन द्यायला आल्यासारखी बाबांच्या पाठोपाठ खाली मान घालून आमच्या घरात आली!

“काका, कां हो असं? आज मला तीर्थ न् प्रसाद कां बरं नाही दिलात?.. ”

” का नसेल दिला?” बाबांनी तिच्याकडे रोखून पहात तिलाच विचारलं. मान खाली घालून तिथेच अभ्यास करीत बसलेल्या मी दचकून बाबांकडे पाहिलं.

“कां? कांही चुकलं का माझं?” तिने विचारलं.

“ते मीच सांगायला हवं कां? सांगतो. ही आत चहा टाकतेय. तूही घे घोटभर. जा. मी आलोच. ”

ती कांही न बोलता खालमानेनं आमच्या

स्वयंपाकघरांत गेली. आई चुलीवर चहाचं आधण ठेवत होती. लिलाताईला पहाताच आईने तिला भिंतीजवळचा पाट घ्यायला सांगितलं. “बैस” म्हणाली. तोवर बाबाही आत आले.

“चहा घे आणि बाहेर जाऊन पादुकांना रोजच्यासारखा एकाग्रतेने मनापासून नमस्कार करून ये. मघाशी तू स्वस्थचित्त नसावीस बहुतेक. त्यामुळेच असेल, आरती होताच तू

नेहमीसारखा देवाला नमस्कार न करताच तीर्थ घ्यायला हात पुढं केला होतास. आठवतंय?म्हणून तुला तीर्थ दिलं नव्हतं. ” बाबा शांतपणे म्हणाले.

तिचे डोळे भरून आले.

“गप. रडू नको. डोळे पूस बरं. ” आई म्हणाली.

“तुम्हा दोघांनाही माझंच चुकलंय असंच वाटतंय माहितीय मला. ” ती नाराजीने म्हणाली.

“तसं नाहीये” बाबा म्हणाले. “आपण चूक की बरोबर हे ज्याचं त्यानंच ठरवायचं असतं. तुझं काही चुकलंय कां हे आम्ही कोण ठरवणार? तो निवाडा काल रात्री तू स्वत:च तर करुन टाकलायस आणि तुझ्या दृष्टीने जो चूक, त्याला त्याची पूरेपूर शिक्षाही देऊन टाकलीयस. ”

“म्हणजे माझ्या बाबांना. असंच ना? मी त्यांना जे बोलले त्यातला एक शब्द तरी खोटा होता कां सांगा ना ” ती कळवळून म्हणाली.

“खोटं काहीच नसतं. पण संपूर्ण खरंही काहीच नसतं. आणि खरं असेल तेही कसं बोलावं किंवा बोलावं की नाही हे ज्याचं त्यानं ठरवायचं. तू जे आणि जसं बोललीस त्यात तुझं काही चुकलं नाही असं तुला वाटत असेल तर तू अस्वस्थ कां आहेस याचा विचार कर. तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुझं तुलाच मिळेल. ”

“हो. बाबांना काल बोलले मी खूप. काय चुकलं माझं?मला खूप रागच नव्हता आला त्यांचा तर दुखावलेही गेले होते मी. अजूनही शांत नाहीये मन माझं. मीच सगळं कां सहन करायचं सांगा ना?” आवाज भरून आला तसं ती थांबली. घुसमटत रडत राहिली.

“तू शांत हो बरं आधी. असा त्रागा करुन तुलाच त्रास होईल ना बाळा?” आई म्हणाली.

“तुम्ही आज ओळखता कां काकू मला? तुम्हाला इथं

येऊन चार वर्षं होऊन गेलीयत. इतक्या वर्षात मला एकदा तरी असा इतका त्रागा केलेलं पाहिलंयत कां तुम्ही सांगा बघू…. ” ती बोलू लागली. जखमेला धक्का लागताच ती भळभळून वहात रहावी तसं बोलत राहिली. तिचा प्रत्येक शब्द ऐकणाऱ्यालाही अस्वस्थ करणारा होता. आईचे डोळेही भरुन आले होते तसे बाबाही चलबिचल झाले.

तिची कशाचबद्दल कधीच कांही तक्रार नसायची. जे तिनंच करायला हवं ते कुणी न सांगता तोवर निमूटपणे करतच तर आलेली होती. तिची आई, वडील, सगळी भावंडं ही सगळी आपलीच तर आहेत हीच तिची भावना असायची. आजपर्यंत तिने घरबसल्या स्वकष्टाने मिळवलेल्या पैशातली एक दमडीही कधी स्वत:साठी खर्च केलेली नव्हती. जे केलं ते सर्वांसाठीच तर केलं होतं. स्वत:चं कर्तव्य तोंडातून चकार शब्द न काढता जर ती पार पाडत आली होती तर तिच्या बाबतीतलं त्यांचं कर्तव्यही बाबांनीही कां नाही पार पाडायचं हा तिचा प्रश्न होता! काल रात्री हेच ती आपल्या वडलांना पुन:पुन्हा विचारत राहिली होती. खरं तर असा विचार तोपर्यंत तिच्या मनात खरंच कधीच डोकावलाही नव्हता,… पण काल… ?

काल तिच्या पाठच्या बहिणीसाठी, बेबीताईसाठी सांगून आलेल्या स्थळाला होकार कळवून तिचे बाबा मोकळे झाले होते त्यामुळे ही दुखावली गेली आणि आज तेच सगळं आठवून तिचे डोळे पाझरत राहिले होते..

“माझ्यापेक्षा फक्त दोन वर्षानं लहान असलेली माझी बहीण आहे ती. तिचं कांही चांगलं होत असेल तर मी कां वाईट वाटून घेऊ सांगा ना?फक्त बहिणीच नाही तर दोन मैत्रिणींसारख्याच आम्ही लहानाच्या मोठ्या झालोयत. तिचं लग्न होतंय, ती मार्गाला लागतेय याचा आनंदच आहे मला. त्यासाठी चिडेन कां मी? पण हा निर्णय घेताना माझ्या वडलांनी मला गृहीत कां धरायचं? मला विश्वासात घेऊन त्यांनी आधी हे कां नाही सांगायचं? खूप शिकायचं, खूप मोठ्ठं व्हायचं असं स्वप्न होतं हो माझं. पण दोघांचे फॉर्म भरायला पुरेशा पैशाची सोय झाली नाही म्हणून एकाचाच फॉर्म भरायची वेळ आली तेव्हाही मला असंच गृहितच तर धरलं होतं त्यांनी. तेव्हाही प्राधान्य कुणाला दिलं तर आण्णाला. तो हुशार नव्हता, पुढं फारसा शिकणार नव्हता तरीही प्राधान्य त्याला. कां तर तो मुलगा म्हणून. म्हणजे मी… मी मुलगी आहे हाच माझा गुन्हा होता कां?तसं असेल तर मी हुशार असून उपयोग काय त्याचा? तेव्हाही आतल्या आत सगळं गिळून तोंडातून ‘ब्र’ही न काढता मी गप्प बसलेच होते ना हो?असंच कां आणि किती दिवस गप्प बसायचं ?

मला संताप अनावर झाला त्याला हे निमित्त झालं फक्त. पण मला राग यायचं कारण वेगळंच आहे. या स्थळाकडून विचारणा आल्यापासून मला विश्वासात घेऊन एका शब्दानेही कांही सांगावं, विचारावं असं त्यांना वाटलंच नाहीय याचा राग आलाय मला. ‘हिला काय विचारायचं? हिला काय सांगायचं? ही थोडीच नाही, नको म्हणणाराय?’ असं त्यांनी गृहितच धरलं याचा राग आला मला. मीही माणूसच आहे ना हो काका? मलाही मन आहे, भावना आहेत हे जन्मदात्या वडलांनी तरी समजून घ्यायला नको कां? हे सगळं स्वतःच स्वत:च्या तोंडानं ठणकावून सांगताना कालही आनंद नव्हताच झाला हो मला. पण न बोलता होणारी घुसमटही सहन होत नव्हती… “

आवाज भरून आला तशी ती बोलायची थांबली.

अस्वस्थपणे येरझारा घालणाऱ्या बाबांनी चमकून तिच्याकडे पाहिलं.

“हे बघ, तू हुशार आहेस. मनानं चांगली आहेस. मी सांगेन ते समजून घेशील असं वाटतंय म्हणून सांगणाराय. ऐकशील?” ते म्हणाले.

तिने डोळे पुसत होकारार्थी मान हलवली.

“हे बघ. आता या सगळ्याचा तू त्यांच्या दृष्टीकोनातून विचार करुन बघ. बेबीसाठी जे स्थळ आलंय ते बिजवराचं आहे. पहिली तीन वर्षांची एक मुलगी आहे त्याला. तो शिकलेला, सुखवस्तू आहे, तरीही कमी शिकलेली मुलगी स्वीकारायला तो तयार होता कारण पहिल्या मुलीचं सगळं प्रेमानं करणारी मुलगी त्याला हवी होती. याबाबतीत काय निर्णय घ्यावा याचं दडपण आपल्या वडलांच्या मनावर असणाराय याचा विचार स्वतःबद्दलच्या एकांगी विचारांच्या गर्दीत तुझ्या मनात डोकावला होता कां? नव्हता. हो ना? खरंतर तुझ्या आधाराची खरी गरज त्या क्षणी त्यांना होती. इतकी वर्षं मी पहातोय एकही दिवस तो माणूस स्वतःसाठी जगलेला नाहीय. राबतोय, कष्ट करतोय, दिवसभर आणि रात्रपाळ्या असताना आठ आठ तास रात्रीही मशीनसमोर उभं राहून दमून भागून घरी आल्यानंतर समोर येईल तेवढा घोटभर चहा आणि शिळंपाकंही गोड मानून तो राबतोय. तरीही राग, संताप, त्रागा, आरडाओरडा यांचा लवलेश तरी आहे कां त्याच्यात? त्या माणसाची स्वत:च्या मुलीनेच केलेली निर्भत्सना निमूट ऐकून घेऊनही शांत रहाताना त्याच्या मनाची आतल्याआत किती घालमेल झाली असेल याचा विचार कर आणि मग मला सांग. शांतपणे विचार करुन सांग. कारणं कांहीही असोत पण आज तो हतबल आहे हे तुझ्यासारख्या समंजस मुलीने समजून घ्यायचं नाही तर कुणी? आणि लग्नाचं काय गं ?तू काय किंवा बेबी काय तुमची लग्नं ठरवायचा निर्णय घेणारे तुझे वडील कोण? ते तर निमित्त आहेत फक्त. या गाठी बांधणारा ‘तो’ त्या तिथे बाहेर औदुंबराखाली बसलाय हे विसरु नकोस. जा. ऊठ. त्याला नेहमीसारखा मनापासून नमस्कार कर फक्त. कांहीही मागू नकोस. जे त्याला द्यावंसं वाटेल ते तो न मागता देत असतो हे लक्षात ठेव. जा. नमस्कार करुन ये आणि मघाशी राहिलेला तीर्थ न् प्रसाद घेऊन जा” बाबा म्हणाले.

त्यांच्याकडून तीर्थ घेण्यासाठी तिने हात पुढे केला तेव्हाही तिचे डोळे पाझरतंच होते.

“शांत हो. काळजी नको करू. सगळं व्यवस्थित होईल. बेबीचं तर होईलच तसंच तुझंही होईल. येत्या चार दिवसात तुला दत्त महाराजांनी ठरवलेल्या स्थळाकडूनच मागणी येईल. बघशील तू “

बाबा गंमतीने हसत म्हणाले. काहीच न समजल्यासारखी ती त्यांच्याकडे पहातच राहिली…!

हा सगळाच प्रसंग माझ्या कायमचा लक्षात राहिलाय ते बाबांना लाभलेल्या वाचासिद्धीची यावेळीही पुन्हा एकदा प्रचिती आली म्हणूनच नव्हे फक्त तर या सगळ्या प्रसंगाचे धागेदोरे माझ्याशीही जोडले जाणार आहेत हे यथावकाश माझ्या अनुभवाला आल्यामुळेच!!

 क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ व्रतोपासना – ६. वृष्टी करणाऱ्या पावसाची निंदा करु नये. ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

व्रतोपासना – ६. वृष्टी करणाऱ्या पावसाची निंदा करु नये. ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

 उन्हाळ्यातील उकड्याने हैराण झालेले आपण पावसाची वाट बघत असतो. मग येणाऱ्या एखाद्या पावसाच्या सरीने पण आनंदित होतो. पावसाचे स्वागत करतो. वर्षा सहली काढतो. गरम पदार्थांचा आस्वाद घेतो. असे करता करता काही दिवसातच पावसाला कंटाळतो. काहींना तर सुरुवातीचा पाऊस पण नको वाटतो. आणि सुंदर पावसाचे नकोशा पावसात रूपांतर होते. अर्थात पाऊस तोच असतो. पण आपलीच मन:स्थिती बदलत असते. त्यामुळे पावसाची निंदा सुरु होते. आणि पावसाचे तोटे सांगणारे वक्तव्य सुरु होते. तक्रारी सुरु होतात. कपडेच कसे वाळत नाहीत. दमट वास येतो. प्रवास कसा अवघड होतो. पाणी कसे साठते असे विषय चर्चिले जातात. त्यात घरी असणारी मंडळी फारच आघाडीवर असतात. कामावर जाणारे आपला बंदोबस्त ( पावसा पासून सुरक्षित राहण्याचा ) करुन आपले कर्तव्य करुन येतात. पण ज्यांना कुठेही जायचे असते अशी मंडळीच किती हा पाऊस असे म्हणून तक्रार करत असतात. एकूण काय पाऊस यावर सगळीकडे टीका सुरु होते. आणि आपल्यालाच हवासा असणारा आणि आवश्यक असणारा पाऊस आपण विसरतो.

पण आपण एक विचार करुन बघू या. ज्या काही अडचणी पावसामुळे येतात असे वाटते त्या खरंच पावसामुळे आल्या आहेत का? रस्त्यावर पाणी साठणे, खड्डे पडणे, पूर येणे अशी संकटे मानव निर्मित आहेत. या सगळ्यासाठी आपणच कुठेतरी जबाबदार आहोत. आणि हे आपण टाळू शकतो. हे पूर्ण आपल्या हातात आहे.

आपण हे लक्षात घ्यायला हवे, निसर्गाला सगळे जग सावरायचे असते. जगवायचे असते. पाऊस हा जीवसृष्टीचा आधार आहे. तो आला नाही तर जीवन अशक्यच आहे. गवत, धनधान्य, भाजीपाला उगवणार नाही. एवढेच नाही तर आपल्याला कोणालाच प्यायला पाणी सुद्धा मिळणार नाही. सगळे चराचर कोमेजून जाईल. म्हणून आपल्या संस्कृतीत वर्षा देवता म्हणतो. ही वर्षा देवता जीवनदायी आहे. म्हणून पूर्वपार तिची पूजा करतो. म्हणून अशा जीवनदायी वृष्टी करणाऱ्या पावसाची निंदा करु नये.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

९/११/२०२४

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रभूवर भूवर शिववीर आला… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

सुश्री अपर्णा परांजपे

🌳 विविधा 🌳

☆ प्रभूवर भूवर शिववीर आला… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

🚩 प्रभूवर भूवर शिववीर आला

तुजसाठी मरण ते जनन

तुजवीण जनन ते मरण…

✍️”दातृत्व” हा दैवी गुण आहे. दैवी संपत्ती.

“स्वीकार” सुध्दा दैवी गुणच आहे ह्याची मला जाणीव झाली. देणे सोपे नाही हे आपण मानतोच पण मन:पूर्वक स्वीकार सुध्दा कठीणच बरं.

वरवर स्वीकारणे व खरे स्वीकारणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. देणार्याने देत जावे व घेणारा त्या क्षमतेचा असेल तरच ती दैवी संपत्ती ची देवाण घेवाण होते.

सद्गुरू परमहंस तळमळत होते त्यांच्या ज्ञानदानासाठी. गोष्ट प्रथम ऐकली विशेष वाटली नाही. पण अनुभवाने समजतंय सत्पात्रही तितकेच महत्त्वाचे आहे. विवेकानंद दिसल्याबरोबर तळमळ शांत झाली व ज्ञानदान करत असताना दैवी आनंदाची अनुभूती दोघांनाही आली.

हा सुयोग असतो ते दैवी कार्य असते ते क्वचितच घडत असते.

त्याला चमत्कार म्हणता येईल. सृष्टी चमत्कार.

असे दैवी संकेत व कार्य अव्याहत सुरू असते.

स्वामीजी हे एक उदाहरण स्वरूप लिहिले.

शंखामध्ये मौक्तिकाची निर्मिती हे दैवी क्षणाचे द्योतक आहेत.

म्हणून देणे व घेणे या परस्परपूरक क्रिया आहेत हे पटते.

यालाच once in a life time opportunity म्हणतात.

एकतर देण्याची किंवा घेण्याची पूर्ण तयारी करणे हेच खरे जीवन आहे. एक मार्ग निवडणे आवश्यक आहे.

(अन्यथा जास्तीत जास्त गोष्टी आपण वायाच घालवतो.)

गुरू शिष्य जोडीच अमरत्व‌ प्राप्त करू शकते. मधला पर्याय नाहीच.

या अशा क्षणांची अनुभूती घेणे अध्यात्म आहे.

||जय भवानी जय शिवाजी ||

।।जय शिवराय।।

छत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांना शहाजीराज्यांनी स्वतंत्र राजमुद्रा तयार करून दिली. ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. ती खालीलप्रमाणे-

संस्कृत :

“प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।।

शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।”

मराठी :

ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो, आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल.

ही अशी जाज्वल्य राजमुद्रा ज्यांची आहे व शुकासारखे पूर्ण वैराग्य व वशिष्ठासारखे ज्ञान असणारे रामदास स्वामी ही उत्तम गुरू शिष्य जोडी आहे. अश्या या सुवर्ण युग निर्मित्यावर स्वातंत्यवीरांनी केलेले कवन म्हणजे सर्वोत्तम कलाकृती च म्हणावी लागेल.

प्रखर देशभक्त, उत्तम कवी व युगनिर्मात्याचे चरित्र हे ह्या कवितेचे वैशिष्ट्य आहे.

सावरकर म्हणताहेत यवनाचा पृथ्वी वर अतोनात भार झाला व हिंदूंची श्रध्दास्थाने व गोमातेचा वध करू लागलेत. हे श्री महाराजांना सहन होणे शक्यच नव्हते. अशा दयनीय परिस्थितीचा सामना करण्यासाठी…

प्रभूवर भूवर शिववीर आला…

हे हिंदूंचे हाल जिजाऊ कसे पाहू शकणार? त्यांना सावरकर जगताची जननी उद्बोधत आहेत. अशा या मातेने शिवबांना असे बाळकडू व ओतप्रोत देशप्रेम दिले व कुलभूषण हा संस्कृतीसंरक्षकच नव्हे तर संवर्धक बनला.

प्रभूवर भूवर शिववीर आला…

सावरकर जिजाऊ शिवबा जोडीची तुलना राम कौसल्या, कृष्ण यशोदा यांच्या शी करतात.

रामकृष्णांनी जसा राक्षसांचा वध केला तसेच महाराजांनी अती क्रूर यवनांचा नि:पात करुन स्वराष्ट्र निर्मिती केली व चंद्र जसा कलेकलेने वृध्दिंगत होतो तसे सुराज्य प्रस्थापित केले.

प्रभूवर भूवर शिववीर आला…

“जय जय रघुवीर समर्थ” चा उद्घोष दिशादिशात घुमला व सर्वोत्तम गुरू शिष्य जोडी उदयास आली. देश व धर्म जागवणे व वाढवणे हेच त्यांचे ब्रीदवाक्य ठरले. राजकारण डावपेच शिकवणारे गुरु कृष्णनीतीची आठवण करून देणारे ठरलेत.

प्रभूवर भूवर शिववीर आला…

पुढील दोन कडव्यात सावरकर अफजलखानाचा अतर्क्य असा खातमा व नंतर आई भवानी चा गोंधळ याचे रसभरीत वर्णन करतात. काय तो दैदिप्यमान सोहळा असेल याची आपण कल्पना केलेली बरी. मातोश्रीचे स्वप्न व कुलस्वामिनी जगदंबेने स्वप्नात भवानी तलवार देणे अद्भुत अलौकिक च असे ते गाताहेत.

प्रभूवर भूवर शिववीर आला…

शेवटी सावरकर गदगद् होऊन म्हणतात या सुपुत्राने “अवतार कार्य” पूर्णत्वास नेले. अशक्य कार्यास अवतार कार्य म्हणताहेत. व कार्यपूर्ती करून निजधामास गेले. अशा या युगपुरुषाचे कवन विनायकासोबत इतर सगळे कवी गाताहेत ही अत्युत्तम कोटी ते करताहेत. (सविनायक कविनायक)

प्रभूवर भूवर शिववीर आला…

असा हा त्रिवेणी संगम आपणासमोर यथामती मांडताना परमानंद होतो आहे.

विनायका हिंदू एकवटला…

जय जय रघुवीर समर्थ..

जय भवानी जयशिवराय..

🚩🚩🚩🚩

© सुश्री अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “…करूया आपण आत्मपरीक्षण…–” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “…करूया आपण आत्मपरीक्षण…–☆ श्री जगदीश काबरे ☆

(3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त)

अपवाद वगळता आजच्या अनेक शिक्षित-अशिक्षित स्रियांना स्वत:ची अशी ओळख आहे का? स्वत:ची अस्मिता, स्वत:चा स्वाभिमान आहे का? मी नेहमी स्रियांना एक प्रश्न विचारत असतो की, तुम्ही शिकून नवीन काय केलं? सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षणाचा तुम्ही उपयोग काय केला? तुम्हाला सावित्रीबाईनी शिक्षण दिलं त्यासाठी अंगावर दगड माती झेलून, त्या शिक्षणाचा तुम्ही काय उपयोग केला? फक्त नवऱ्याची सेवा करायला, संत्संगला जायला, पोथीपुराणे वाचता यावीत, उपासतापास करता यावेत, वैभवलक्ष्मीची पारायणे करता यावीत याच्यासाठी सावित्रीबाईनी तुम्हाला शिक्षणासाठी उद्युक्त केलं का? याच्यासाठी सावित्रीबाईंनी का दगड-माती खाल्ले? याच्यासाठीचं का सावित्रीबाईंनी वाटेल तसा मान-अपमान सहन केला? कशासाठी केला त्यांनी हा उपद्व्याप? तुम्ही चांगल्या साड्या नेसाव्यात म्हणून? तुम्हाला पार्लरला जाऊन स्वत:ला नटता यावे म्हणून? ह्या शिक्षित स्रियांनी नवीन काय केलं? दोनशे वर्षापुर्वीही स्री हे सर्व न शिकता, आपल्या, मुलाबाळांना, पतीला, सासू-सासऱ्याला न्याय देत होती की. न शिकताच सर्व करीत होती तर मग तुम्ही नवीन काय केलं?

सावित्रीबाई फुले यांच्यामुळे गेल्या काही वर्षात स्त्री शिकू लागली. शिक्षण, अर्थार्जन असे टप्पे घेत तिने चक्क अंतराळात झेप घेतली. सारे कसे तिच्या मनासारखे झाले. पण तिचे जळणे, सोसणे आणि तोंड दाबून बुक्क्याचा मार थंबला का? वर्तमानपत्रातील बलात्काराच्या बातम्या, हुंडाबळी आणि मारहाणीच्या बातम्या ओरडून, किंचाळून सांगताहेत की, स्त्रीचे जळणे अद्याप सुरू आहे. विद्याविभूषित आणि भरमसाठ पगार घेणारी स्त्रीसुध्दा कधीकधी सासुरवासाच्या नरकात अशी पिळवटली जाते की, मानहानी सहन न होऊन आत्महत्येचे पाऊल उचलते. स्वत:ला आधुनिक समजणाऱ्या प्रथितयश अभिनेत्रीनासुध्दा स्त्रीदेहाचे प्रदर्शन आणि कधीकधी शोषण करू दिल्याशिवाय पर्याय उरत नाही. हे सारे पाहिले की वाटते, आजही स्त्रीचे सती जाणे सुरूच आहे. फक्त त्याचे स्वरूप, संदर्भ व परिस्थिती बदलली आहे. स्त्री खरेच मुक्त झाली आहे का?🤔

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वर्ष सरते शेवटी… ☆ डॉ. सोनिया कस्तुरे ☆

डॉ. सोनिया कस्तुरे

वर्ष सरते शेवटी…  ☆ डॉ. सोनिया कस्तुरे ☆

पाहता पाहता २०२४ संपत आले, नव्हे संपलेच. प्रत्येक नवीन वर्षात अनेक गोष्टी, अनेक घटना घडतात. काही खूप संवेदनशील असतात, तर काही आयुष्यभर आनंद, उत्साह निर्माण करणाऱ्या असतात. तर काही, जे घडले, ते घडले नसते तर बरे झाले असते. असे मनाला वाटून जाणाऱ्या असतात. काही आनंद, दुःखाची झालर वा अस्तर लावून येतात. पण चेहऱ्यावर कधीच त्याच्या छटा दिसू दिलेल्या नसतात. पण असे का ?  खरे जगावे, सुखात आनंदी, तर दुःखात थोडी निराशा दाखवण्याचे स्वातंत्र्य आहेच ना आपल्याला.  मनाच्या सगळ्या भावना जशा आहेत, तशा सम्यक पद्धतीने व्यक्त करता येतील अशा व्यक्ती असतातच आपल्याकडे. त्या पारखायला हव्या. मनातली आशा मात्र कायम जीवंत राहायला हवी. थोडा अंधार जास्त आहे पण त्यामुळेच तर उजेडाचे महत्व अधोरेखित होत आहे.

आजपर्यंत समविचारी आपण सगळे सोबत होतो. आजही सोबत आहोत. आणि यापुढेही कायम सोबत राहू. स्त्रीने तिच्या स्त्रीपणाच्या चौकटीतून बाहेर पडताना स्वतःला पुरुषसत्ताक मानसिकतेचे वाहकत्व टाळू शकेल, आणि स्त्री पुरुष दोघांचा मानवतेच्या दिशेने, समतेच्या वाटेने नव्या आधुनिक प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करता येईल ही आशा आहे.

प्रेमाला व्यवहाराचे स्वरुप प्राप्त झाले आहे हे खरे आहे. पण विनाअट / निर्हेतू प्रेम नव्याने जन्माला येईलच. ही आशा सोडायची नाही. आणि ते प्रत्येकाच्या वाट्याला येईल अथवा न येईल, आपण स्वतःवर मनापासून प्रेम करायला शिकूया. खरे जगूया, खरे बोलूया  ! एकमेकांच्या सोबत सुख दुःख वाटून घेऊया..!

वर्षाचा शेवटचा महिना जसा.. तसा अडचणींचा, वाईट घटनांचा, दुःखाचा शेवटचा महिना असता तर, वेदनांना कायमचा निरोप देता आला असता तर.. वेदनांचे तण उपसून काढता आले असते तर, अगदी मुळापासून खोल मनातून. जसे कॕलेंडर भिंतीवरुन कायमचे हटवतात तसे…! कधीही परत दिसणार नाही असे.. आनंदी क्षणांचे वट वृक्ष झाले असते तर मग समाधानाचा फुलोरा नक्कीच दिर्घकाळ बहरत राहिला असता नाही का.. !

नको असलेलेच जास्त डोके वर काढताना दिसते. जे जे गंधीत ते जणू शापित वाटू लागते. चांगल्या आठवणी आठता येत नाहीत. साठवता येत नाहीत. कुणाला सांगता येत नाहीत. या व्यवहारी जगात चांगल्या आठवणींचा कचराच होताना दिसतो. ते ही दूर दूर निघून जातात. उजाड माळरान मागे ठेवून. असे वाटणे ही तर मनाची अडचण असते. परत मशागत करायला हवी. स्वतःला अंतःपर्यंत सुगंधीत ठेवण्यासाठी.

खरंतर वेदनेचे गाणे करता यावे आणि संवेदनांनी ते गात रहावे. आणि हो आनंदाचा उन्माद होऊ नये एवढं मात्र नक्की करावे.

 ग़म का ख़ज़ाना तेरा भी है, मेरा भी

ये अफ़साना तेरा भी है, मेरा भी

अपने ग़म को गीत बना कर गा लेना

राग़ पुराना तेरा भी है, मेरा भी

© डॉ. सोनिया कस्तुरे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “नदीचा काठ…” ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

🌸 विविधा 🌸

☆ नदीचा काठ… ☆ प्रा. भरत खैरकर 

नदीचा काठ आता पहिल्यासारखा स्वच्छ राहिला नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत या काठाला आता उसंत नसते. लोक म्हणतात, उन्हाळ्यात नद्या आटतात. मात्र गावची नदी बारमाही सारखीच धो.. धो.. वाहणारी दोन्ही – हातांनी एखाद्या दात्याने भरभरून दान द्यावे. तसं या नदीने आमच्यां गावाला खूप दिलंय. विहिरी आटल्या तरी नदीची धार मात्र खंडत नाही.. शंकराच्या जटेतून निघालेल्या गंगामाईसारखी!!  या नदीची काही कहाणी असेलसं वाटत नाही.

दहा बाय दहाच्या खोलीत आपला संसार छानसा थाटावा, तसा या नदीचा उगम अगदी छोट्या जागेत सामावलेला.. गावापासून चंद्रपूर जिल्ह्यातील खुर्सापार या जंगलातून.. एका डोंगरवजा भागात.. तिची उत्पत्ती झाल्याचे आढळुन येते. एक भला मोठा झरा उंचावरून धबधब्यासारखा अव्याहत खाली वाहतो.. चांदण्यात ही दुधाची धार जणू आकाश धरतीच्या पदरात प्रेमाने टाकतोय.. असं वाटते.

आजूबाजूला उंचच उंच सागवनी वृक्ष.. निसर्गाचं हे रूप पाहात कित्येक सालापासून उभे आहेत. त्या परिसरातील सागाच्या झाडांची वाढ कमालीची झाली आहे. जंगलात सर्वत्र फिरून झाल्यावर निसर्ग याच ठिकाणी इतका ‘खुश’ कसा हे शोधलं तर मुळाशी तो उगम दिसेल..

 साधारण पन्नासेक फुटावरून खालच्या दगडांवर पडणारी ती जाडशी पाण्याची धार हळूहळू घाटदार वळण घेत संथ होते, छोटसं नितळ पाण्याचं तळं.. ते वलयांमुळे अजूनच उठून दिसतं.. मनात भावनांचे हळूवार तरंग उठावे तसे  ह्या पाण्याचे तरंग धारेच्या केंद्रापासून दूरवर काठापर्यंत जाऊन हळूहळू संथ रूप धारण करतात.. मग हे पाणी कड्याकपारीतून मार्ग काढीत. एका नाल्याचं रूप धारण करतं, माणसाचं आयुष्य जसं कधी दुःख तर कधी सुखाच्या अनुभवांनी पुढे पुढे सरकते.. अगदी तस्सच.

या छोट्याशा नाल्याचं, हळूहळू जंगलातून ‘आलेले इतर छोटे छोटे नाले स्वागत करीत त्या नाल्यास येऊन मिळतात, ‘एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ’ हे या निसर्ग घटकांना कोणी शिकविले कुणास ठाऊक?

आता ही नदी जंगलातील चार-पाच खेड्यांतून आमच्या गावात येते.. ती सरळ गावाच्या मधोमध घुसते..

नदीच्या या घुसखोरीमुळे उगाच एका मोठ्याशा गावाचे दोन भाग झाले. पूर्वेकडचा ‘सिर्सी’ नि पश्चिमेकडचा ‘काजळी’असं नामकरण झाल.

 आता मात्र सिर्सी हेच नाव प्रचलित आहे. तरीही जुन्या माणसांनी ‘कुठं रायतं बाबू?’ म्हटलं का नवीन पोर ‘सिर्सीले रायतो जी !’ उत्तर देतात आणि मग तो माणूस जेव्हा ‘सिर्सी (काजळीच) ना?’ म्हणतो तेव्हा ही पोरं नंद्यांसारखे ‘होजी’ म्हणून होकार भरतात.

नदीमुळे एक बरं झाले.. इतर गावासारखी आमच्या गावाला अजिबात पाण्याची फिकीर करावी लागत नाही. आमच्या लहानपणी आम्ही आईसोबत धुणं धुवायला नदीवर जात होतो.. धुणं धुवायला म्हणजे काय तर तिथं जाऊन काठावरच्या मऊ मऊ रेतीत खेळायला.. पाण्यात पाय ओले करायचे अन् मग आपणच उकीरड्यावर लोळणा-या गाढवासारखं रेतीत लोळायचं.. त्याच्याने ओल्या झालेल्या पायावर रेतीचे मोजे तयार व्हायचे.. जसजशी ऊन तापायची तसतसे त्यातील ओलावा संपल्याने ते मोजे गळून पडायचे! या मोज्याचं आम्हांला तेव्हा भारी अप्रुप वाटायचं.

पायात मोजे घालूनच आमच्या इमारती उभ्या करायचा व्यवसाय चालायचा.. मात्र या इमारती नुसत्या वाळूच्या आणि पाण्याच्या ! हीच त्याची खरी खासियत होती. नानाविध तऱ्हेच्या त्या इमारतीचे ‘स्ल्याब’ मात्र वर्तुळाकारच राहायचे. काही काही इमारतींना कुंपण म्हणून बोटबोटभर.. काड्या सभोवताल लावल्या जायच्या.. त्या रक्षणाचं काम करायच्या… कधीकधी असलाच तर रस्त्यावर सापडलेला सुताचा गुंता येथे तार म्हणून वापरला जायचा.. काहींची घरे एवढी महागडी असायची की त्यांच्या घरात विजेची सोय असायची आणि हे दिवे बाभळीच्या पांढऱ्या काट्यांवर खुपसलेल्या बकरीच्या लेंड्या असायच्या ! काहींच्या घरासमोर किमती मोटारगाड्या.. तुटलेल्या विटांच्या रूपात उभ्या राहायच्या.. रेतीत कोरलेला रस्ता जणू डोंगर पोखरून तयार केल्यासारखा वाटायचा. या सर्व गाड्यांचे डायव्हर मात्र रिमोट कंट्रोलसारखे आपआपल्या जागी बसून फक्त हाताने. गाडी ढकलायचे. बिना ड्रायव्हरचा तो अनोखा प्रवास असायचा.

ज्या कुणाला या चैनीच्या गाडीघोड्यांच्या ‘ लाईफ’ मधे रस नसायचा ते वडिलोपार्जित शेतीचा व्यवसाय करायचे.. नदीकाठाने वाढलेला तरोटा आणि अजून अशाच काही बाही पालेभाजी सदृश वनस्पती उपटून ते ‘मंडई’ मांडत होते.. मग खरेदी करणारे सिगारेटच्या पाकिटच्या, माचीसच्या कव्हरच्या अवमूल्यन न झालेल्या नोटांनी घरच्यासाठी भाजीपाला खरेदी करायचे, काहींचे वावरंही त्या रेतीतच होते. मुख्य म्हणजे रेती चोपडी करून त्यात चौकोनी चौकोनी वाफे करणे खूपच सोपे..

शिवाय उपडलेला काठावरचा तरोटा त्या चौकोनाच्या चौरस्त्यावर एकामागून एक रांगेत लावला की, पाच मिनिटात हिरवंगार शेत दृष्टीस पडे !

असे एक ना अनेक खेळ या नदीकाठावर आम्ही खेळायचो! पडलो, धावलो, मारामाऱ्या सारंसारे येथे केलं. पण मऊशार रेतीवर थोडासाही धक्का कधी लागला नाही. आईने आपल्या पोराला कुशीत घेऊन थोपटावं.. तसंच या काठाने आमचं बालपण जोजावले..

नदीचा काठ आठवला की बालपण ‘फ्कॅशबॅक’ सारखं काठावर जाऊन थांबतं..

नदी, नदीचा उगम, छोटसे तळे, त्यातील तरंग, तिचा गावांपर्यंतचा प्रवास, तिचं गावात प्रवेश करणं.. आम्हां चिमुकल्यांचे तिच्या काठावरचे संसार.. सारं सार

एका पहाटधुक्यासारखे विरळ होत जाऊन गत स्मृतींनी गळा भरून येतो. तेव्हा डोळ्यातील पाणी त्या नदीत जाऊन मिसळत नसेलच कशावरून ??

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सावित्रीबाईंच्या मनातलं… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी `

🌸  विविधा  🌸

☆ सावित्रीबाईंच्या मनातलं☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

मी सावित्री बोलतेय गं माझ्या लेकींनो तुमच्याशी. मलाही थोडं मन मोकळं करावसं वाटतयं नं तुमच्या जवळ!

आज तुम्ही सगळ्या माझ्या कामाची दखल घेऊन कृतज्ञता व्यक्त करता आहात नं!खूप बरं वाटतयं मला!खरचं तेव्हा मला खूप कष्ट पडले गं मुलींनो प्रवाहा विरुद्ध पोहोतांना! सगळ्या समाजाचा विरोध होता मुलींना शिकवण्यासाठी. पण माझ्या पतीचा ज्योतीबांचा भरभक्कम हात होता माझ्या पाठीवर म्हणून मी तरून जाऊ शकले. अर्थात मलाही तेव्हढं धैर्य गोळा करावच लागलं बरं का?

का शिकवायचं नाही मुलींना याचं मुख्य कारण काय सांगायचे तेव्हाचे बुजरूक माहिती आहे का?ते म्हणायचे, मुलींना शिकवलं तर त्या आपल्या याराला पत्र लिहितील आणि त्याच्या सोबत पळून जातील. पण नंतरच्या काळात साने गुरूजींनी ठाम पणे सांगितले की खूप काळाने दाव्याला बांधलेली गाय सोडली की ती हुंदडते व आपल्या वासरासाठी घरी परतते. त्याचप्रमाणे स्त्री सुद्धा खूप काळ बंधनात होती म्हणून थोडा काळ भरकटल्यासारखी दिसेल पण आपल्या पिल्लांसाठी घरट्यात परतेलच!बरोबर आहे न गं मुलींनो! आतापर्यंत तरी तुम्ही त्यांचे बोल खरे करून दाखवले. शिकून, नौकरी करून, स्वातंत्र्य घेऊनही घरटं नीट सांभाळलं. आपल्या भारतीय संस्कृतीचे पाळंमुळं घट्ट धरून ठेवलीत.

पण आजकाल थोडं थोडं चित्र बदलू लागलयं का गं?मुली वरवरचं रूपडं बघून प्रेमात पडतात आणि स्वतःचंच जीवन उद्ध्वस्त करताहेत!अगं मला माझ्या ज्योतिबांनी पूर्ण स्वातंत्र्य दिलं म्हणून माझ्या हातून येव्हढं मोठं कार्य घडलं. पण मी आपल्या भारतीय संस्कृतीशी नाळ जोडलेलीच राहू दिली. कारण पाळंमुळं खोलवर रूजली होती मनात. शिकून मुलींनी उंच झेप घ्यावी. स्वतःची उन्नती करून घ्यावी. हेच चित्र होतं माझ्या डोळ्यापुढे तेव्हा. बरोबर होत ना गं ते!तुम्ही पण ते चित्र छान रंग भरून सर्वांसमोर आणलं बरं का!मला खूप अभिमान वाटतोय त्याचा.

पण एक सांगू का तुम्हाला?तुम्ही शिक्षणाचा उपयोग आपल्या उन्नती बरोबर आपल्या देशाची, संस्कृतीची शान राखावी या करताच करा हं मुलींनो. आज आपले मुलं मुली कुठल्या दिशेने धावताहेत याकडे वेळीच लक्ष द्या बरं का?दुसर्‍या संस्कृतीमधील चांगल्याबरोबर वाईटही गोष्टी आधुनिकतेच्या नावाखाली उचलू नका. अन्यथा पश्चात्तापाची वेळ येईल. अजूनही लगाम तुमच्याच हातात आहेत. ते आवरा, उधळू देऊ नका. “सावित्री बाईंनी स्त्री शिक्षणाचे दरवाजे खुले केले” या शब्दांना अलगद सांभाळणं, या शब्दां बरोबरचं माझाही मान राखणं आता तुमच्याच हाती आहे बरं का!कारण मी हाती घेतलेला वसा मी तुमच्या हाती खूप विश्वासाने सोपवला आहे. माझा विश्वास सार्थ करणे तुमच्याच हाती आहे.

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares