मराठी साहित्य – विविधा ☆ “WhatsApp वर बोलू काही…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “WhatsApp वर बोलू काही…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांनी आयुष्यावर बोलू काही… असा एक खास आणि छान कार्यक्रम सगळ्यांना दिला. त्यावरून हे सुचल.

खर तर आयुष्यावर बोलू काही म्हणत खरेच (खरेच म्हणजे संदिप खरे) बोलले आणि सलील कुलकर्णी यांनी गाणी म्हटली आम्ही फक्त त्यांचे (खरे) बोलणे आणि सलील यांची गाणी ऐकली. (त्यांचे आडनावच खरे अस असल्याने जे बोलले ते खरे बोलले असेच म्हणावे लागेल.) आम्ही कार्यक्रम सुरू असताना बोललोच नाही. बोललो असेल ते सुद्धा आपसात. इतका मंत्रमुग्ध करणारा हा कार्यक्रम.

आयुष्यावर बोलू काही… आणि WhatsApp वर बोलू काही यात काही साम्य आहे. तर काही फरक.

साम्य अस कि आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम प्रामुख्याने दोघांचाच आहे, तिसरा हा सहाय्यक म्हणून असतो. तसाच WhatsApp वर बोलू काही हा कार्यक्रम देखील दोघांचाच आहे.

आयुष्यावर… यात काही वेळा दोघांची जुगलबंदी बघायला मिळते, तशीच जुगलबंदी WhatsApp वर… यावेळी असते.

जुगलबंदी बरोबरच या कार्यक्रमात काहीवेळा संदिप खरे बोलत असतात तेव्हा सलील शांतपणे ऐकत असतात. WhatsApp वर… या कार्यक्रमात देखील एकजण बोलत असतांना दुसरा शांतपणे ऐकत असतो. किंबहुना त्याला फक्त ऐकावेच लागते. त्याने मधे बोलण्याचा प्रयत्न केला तर… वाढलेल्या आवाजात जुगलबंदी सुरू होते. आणि ती तितकी श्रवणीय नसते.

दुसरे साम्य अस कि या गाण्याच्या कार्यक्रमात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आपलीशी वाटणारी गाणी आहेत. अग्गोबाई… देते कोण… देही वणवा पिसाटला… पासून मी मोर्चा नेला… दमलेल्या बाबाची कहाणी… अशी सगळ्यांसाठी व काही अंतर्मुख करणारी गाणी आहेत.

तसच WhatsApp वर बोलू काही. यात यश, वाढदिवस, लग्न, चिमुकल्यांचे आगमन, उत्सव, सणवार ते श्रध्दांजली पर्यंत  सगळ्यांसाठी आनंद देणाऱ्या आणि दु:खाच्या गोष्टी फोटो आणि व्हिडिओ सह येतात.

फरक असा आहे की आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम व्यवस्थित नियोजन करून होतो. त्या कार्यक्रमाची तारीख, वार, वेळ, ठिकाण, कार्यक्रमाचा साधारण कालावधी हे ठरलेल असत. तसेच त्याची जाहिरात देखील होते. कदाचित कार्यक्रमाची रंगीत तालीम देखील होत असावी.

पण WhatsApp वर बोलू काही या कार्यक्रमाचे मात्र कोणतेही नियोजन नसते. वेळ, काळ, आणि त्यावेळी होणारा WhatsApp चा (अति) वापर यावरून हा कार्यक्रम केव्हाही, कुठेही होऊ शकतो. वेळ (कार्यक्रम सुरू होण्याची, आणि संपण्याची) त्या त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असते. या कार्यक्रमाची जाहिरात नसते. (पण कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या काही व्यक्तींकडून खाजगीत सर्वदूर पसरणारी चर्चा होण्याची शक्यता असते.)

थोडक्यात आयुष्यावर बोलू काही याची जाहिरात करावी लागते, WhatsApp वर बोलू काही याची जाहिरात काहीवेळा कार्यक्रम संपल्यावर (रंगून आणि रंगवून) होते. रंगीत तालीमची गरज नसते. उत्स्फूर्त आणि जोशपुर्ण सादरीकरण असते.

दुसरा फरक WhatsApp वर बोलू काही या कार्यक्रमात काही वेळा जोडी बदलते. नवराबायको, आईमुलं, वडीलमुलं अशा जोड्या बदलत असतात. तिसरा येथे सहाय्यक म्हणून असतो.

आयुष्यावर… यात आवाज सगळ्यांपर्यंत ऐकू जाईल याचा प्रयत्न. तर WhatsApp……. यात आपल बोलण दोघांतच आणि दोघांचच राहिल याची दक्षता. पण आवाज मोठा असतो. काही वेळा परिस्थिती नुसार नुसत्या डोळ्यांनीच हा कार्यक्रम होतो.

आयुष्यावर… यासाठी घराघरांतून लोकं ऐकण्यासाठी शक्य असल्यास मित्रमंडळीसह जातात. तर WhatsApp…. हा कार्यक्रम खाजगीतला, कौटुंबिक  असतो.

पण एक नक्की… आयुष्यावर बोलू काही हा मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम आहे. आणि अवेळी आणि अती होणाऱ्या WhatsApp च्या वापरानंतर WhatsApp वर बोलू काही हा अंतर्मुख करणारा कार्यक्रम आहे.

WhatsApp वाईट नाही. पण चांगल काय आहे? किती, केव्हा, कुठे, कसं वापरायचं हे समजलं तर WhatsApp वर बोलू काही हा कार्यक्रम देखील आयुष्यावर… याचा इतकाच चांगला होईल.

WhatsApp वर बोलू काही, हे WhatsApp वरच लिहून पाठवत असल्याने येथेच कार्यक्रम थांबवतो…

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दृष्टी दिन : 12 ऑक्टोबर… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🌸 विविधा 🌸

☆ दृष्टी दिन : 12 ऑक्टोबर… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

 लहानपणी शिकलेला व कायम लक्षात राहणारा एक धडा आठवला डोळ्यांचा भाव असे नाव होते. त्यातही डोळ्यांची किंमत एका एक डोळा नसलेल्या श्रीमंत व्यक्तीने सांगून डोळस माणसाचे डोळे उघडले होते.डोळ्यां वरून खूप म्हणी व वाक्प्रचार पण आहेत.आणि डोळ्यांचे उपयोग पण खूप आहेत.अगदी व्यक्ती शब्दाने बोलू शकत नसेल तरी डोळ्यांनी बोलतो.डोळ्यांची भाषा कधीच खोटे बोलत नाही.डोळे माणसाच्या मनाचा आरसा असतात.डोळे वाचता आले की माणूस वाचता येतो आणि समजतो.मग आपकी नजरोने समझा असेही होते.जसे नजरेने भाव वाचले जातात तशी नजर लागते पण.मग काय नजर काढावी लागते.ही नजर केव्हा,कुठे,कोणाची लागली?ती कशी काढायची हे प्रेमळ नजरेला व्यवस्थित कळते.तसेच एखाद्या चांगल्या उत्तम गोष्टींवर डोळा पण ठेवला जातो.हा डोळा त्यातील भाव चांगले असतील तर नजर लागी राजा असे होते. किंवा आँखो ही आँखो मे इशारा पण होतो. अगदी लहान बाळाचे भाव व्यक्त करणारे निरागस डोळे त्याच्या भावना सांगून जातात.तर म्हातारे,आजारी लुकलुकणारे डोळे पण बरेच काही सांगून जातात.माणूसच काय पण पशू,पक्षी हे सुध्दा डोळ्यांनी बोलतात.फक्त डोळे वाचण्याची नजर हवी.

डोळ्यांचे रंग,रूप,आकार खूप भिन्न भिन्न असतात.नुसते डोळे दिसले तरी व्यक्ती ओळखू येते.सध्याच्या स्कार्फ लपेटून घेण्याच्या काळात फक्त डोळ्यांच्या मदतीने माणूस ओळखण्याची कला चांगलीच अवगत झाली आहे.अगदी कोणतेही सौंदर्य टिपायचे असेल तर आपला व कॅमेऱ्याचा दोन्ही डोळे उत्तम असावे लागतात.एखाद्या मंदिरात गेल्या नंतर उघड्या डोळ्यांनी ती अंतर्मनात साठवून घ्यावी आणि नंतर जेव्हा जेव्हा डोळे बंद करू त्या वेळी ती अंतर्चक्षूंनी पहावी.हे खरे दर्शन.त्राटक ध्यान करताना डोळ्यांचे खूप महत्व.नुसते बाह्य डोळे तर महत्वाचे असतातच पण त्याच बरोबर नजर असावी लागते.आणि  सिद्ध हस्त  नजर असेल तर कोणतीच गोष्ट त्या नजरेतून सुटत नाही.किंबहुना असे म्हणणे योग्य ठरेल की,ती नजर सगळ्यातले चांगले टिपून घेते.ज्याला कोणातील चांगले दिसत नसेल त्याला सहज आंधळा आहेस का म्हंटले जाते.किंवा काहीजण डोळे असून पण आंधळे असतात.म्हणजे डोळ्यांनी बघतात.पण त्याचा अर्थ लक्षात घेत नाहीत.

अशा उपयुक्त जग,चराचर दाखवणाऱ्या डोळ्यांची काळजी पण तितकीच महत्त्वाची.त्या साठी खाणे,पिणे ( योग्य प्रमाणात पाणी ),विश्रांती,व्यायाम आवश्यक आहे.

डोळे त्याचे वाक्प्रचार,म्हणी,गाणी, डोळसपण,नजर,डोळ्यातील भाव,वेळोवेळी डोळ्यात येणारे पाणी,डोळ्यांची काळजी,त्या साथीचे उपाय असे वेगवेगळे लेख होऊ शकतात.

डोळसपणे डोळ्यांनी वाचल्यामुळे योग्य नजर मिळते.असे बरेच लेख वाचून बरेच विषय मिळतात.असे म्हणता येईल,काही लेखा मुळे डोळे उघडले जातात.आणि नवीन नजर मिळते.अशीच नवीन नजर मिळण्या साठी नवीन लेख वाचण्याची डोळ्यांना उत्सुकता असते.

आणि हे सगळे करण्यासाठी आजचा दिवस! डोळ्यांची जपणूक व आरोग्य याचे महत्व सांगणारा!

© सुश्री विभावरी कुलकर्णी

हिलिंग, मेडिटेशन मास्टर, समुपदेशक.

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अमिताभ….’शहेनशहांचा शहेनशहा’… ☆ श्री राहूल लाळे ☆

श्री राहूल लाळे

?  विविधा ?

अमिताभ….’शहेनशहांचा शहेनशहा’… ☆ श्री राहूल लाळे ☆

हा ‘शहेनशाह’, ‘दि ग्रेट गॅंबलर’, ‘खुद्दार’, ‘देशप्रेमी’ च नाही ‘महान’ नायक आहे, जो ‘कभी-कभी’ ‘मजबूर’ ‘एकलव्य’ ही होता.   ‘अग्निपथ’ वर हा ‘आज का अर्जुन’ बनून या ‘नमक हलाल’  ने ‘गंगा की सौगंध’ घेत  ‘नि:शब्द’  ‘आखिरी रास्ता’ पार पाडत  ‘मुकद्दर का सिकंदर’ बनला. याच्या ‘नसीब’ ने या  ‘अजूबे’, ‘जादूगर’ ला कधी  ‘डॉन’ बनवून  ‘जंजीर’ मध्ये  ‘गिरफ्तार’ केलं  तर कधी ‘शराबी’ समजून ‘जुर्माना’ लावत  ‘अंधा कानून’ च्या  ‘खाकी’ वर्दीच्या  हवाली केलं.  आयुष्यात कितीही चढ उतार  झाले तरी  ‘कभी खुशी कभी गम’ ची  ‘दीवार’ या  ‘मर्द’ माणसाच्या  ‘जमीर’ च्या  ‘शान’ ला  ‘ब्लॅक’ करू शकली नाही.  या  ‘कालिया’ च्या यशाचा  ‘सिलसिला’ ‘सात हिंदुस्तानी, ‘अजूबा ‘, ‘अमर अकबर अँथनी ’, ‘गंगा जमुना सरस्वती, ‘बॉम्बे टू गोवा’ पर्यंत अजूनही गायला जातो.

‘आनंद’ ने ‘खून-पसीना’ गाळला  नसता तर तो  ‘अकेला’ ‘हेरा-फेरी’ करून सुद्धा  ‘कुली’ च्या पुढं  पाऊल टाकू शकला नसता, पण हा  ‘लावारिस’ ‘रेश्मा और शेरा’ बनून  ‘वक्त’ च्या  ‘कसौटी’ ला खरा उतरून त्याच्या ‘मंजिल’ पर्यंत पोचला आणि  ‘हम’ सारे  बोललो  ‘गॉड तुसी ग्रेट हो’

रामगोपालच्या ‘आग ‘ चे ‘शोले ‘ आणि त्यातला ‘बदला ‘ विसरून तो ‘पिकू’ चा  ‘पा’ बनला.  ‘एक अजनबी’ मधला अंगरक्षक ‘आँखे ‘ करारी ठेवत ‘पिंक ‘ मध्ये काळा  डगला चढवून ‘गहरी  चाल’ खेळला.

एवढा ‘तुफान ‘ गाजावाजा होत असताना ‘चुपके चुपके ‘ चा  ‘याराना ‘ ‘दोस्ताना ‘ याला  ‘राम  बलराम’ पर्यंत  आणि ‘लावारिस ‘ ‘लाल बादशाह’ ला ‘खुदा गवाह ‘ आहे ‘सूर्यवंशम’ पर्यंत घेऊन गेला.

‘त्रिशूल*धारी  हा  ‘देशप्रेमी’  कधी ‘मि  नटवरलाल ‘ च्या खोड्या करत ‘ ठग ऑफ हिंदुस्तान’ झाला . आईचा ‘सुहाग ‘जपत  ‘काला पथ्थर ‘ फोडून लोकांच्या ‘रोटी कपडा  और मकान ‘ साठी लढला.  . ‘बरसात कि एक रात ‘  मधल्या पावसासोबत या *’बागबान’ ने  ‘ मोहोब्बते ‘ ने रसिकांच्या मनात प्रेमाच्या बागा फुलवल्या.

अजब हा ‘भूतनाथ’ ‘बडे मियाँ ‘ ‘छोटे मियाँ ‘ च्या *झुंड मध्ये ‘ करोडपती’  करत ‘शहेनशहांचा शहेनशहा’ बनला…आणि एवढं सगळं करुन *बुढ्ढा होगा तेरा बाप म्हणायला हा तयारच

दादासाहेब फाळके अवॉर्ड विजेत्या महानायक ” फॉरेव्हर अँग्री यंग  मॅन शहेनशाहोंके शहेनशाह अमिताभ बच्चनला ‘ वाढदिवसाच्या आभाळभर  शुभेच्छा !!!

© श्री राहुल लाळे

पुणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जागतिक मानसिक आरोग्य दिन (दहा ऑक्टोबर)… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🌸 विविधा 🌸

जागतिक मानसिक आरोग्य दिन (दहा ऑक्टोबर)… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

१० ऑक्टोबर १९९२ रोजी प्रथम हा दिवस साजरा करण्यात आला. माणसाला जसे शरीरिक आजार होतात तसे मानसिक व्याधी सुद्धा होत असतात.पण या वैयक्तिक पातळीवर असल्याने लवकर दिसून येत नाहीत.

आपण मुलांच्या विषयी विचार करु. व काही छोट्या छोट्या गोष्टीं मधून मुलांचे आरोग्य लहानपणी पासूनच योग्य राखू या.

मुलांचे मानसिक आरोग्य मुलांना सुद्धा मानसिक ताण असतात.कोणत्या प्रकारचे ताण असतात बघू या.

लहान बाळाला काहीतरी करून दाखवायला लावणे .

बोलायला लावणे.

पाहुण्यांच्या समोर वस्तू दाखवायला लावणे.

वेगवेगळ्या कृती करायला लावणे.

बडबड गीते म्हणायला लावणे.

 लहान वयातच शाळा,पालक,समाज त्यांच्या कडून मोठ्या अपेक्षा ठेवतात.

बरेचदा पालक दुसऱ्या मुलांच्या बरोबर तुलना करतात.

काही पालक सतत मुलांची काळजी करतात.

या मुळे मुलांवर ताण येतो.आपल्या साठी या सगळ्या सोप्या गोष्टी असल्या तरी मुलांच्या साठी मनावर ताण आणणाऱ्या परीक्षा असतात.काही मुले तर आईला काळजी वाटेल हा विचार सतत करतात आणि त्यातून स्वकेंद्री होतात.आपण एखादी गोष्ट केली तर आईला काय वाटेल या मानसिक दबावाखाली असतात.कधी घरात मतभेद असतील आणि मुलांच्या समोर भांडणे होत असतील तर मुले कोमेजून जातात.

मग अशी मुले अबोल होतात.सगळे येत असून व्यक्त होत नाहीत.आणि या गोष्टीची आई वडील जास्त काळजी करतात.असे एक वर्तुळ तयार होते.आपल्याला हेच वर्तुळ मोडायचे आहे.त्या साठी काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत.त्या बघू या.

मुलांना रिलॅक्स व्हायला मदत करायची त्या साठी पुढील गोष्टी करु शकतो

१) चित्रे काढणे

२) चित्रे रंगवणे

३) डान्स करणे

४) व्यायाम करणे

५) मॉर्निग/इव्हिनिंग वॉक

६) त्यांच्याशी गप्पा मारणे

घरातील वातावरण

१) मुलांच्या समोर वाद करु नयेत

२) घरात एकमेकांशी सुसंवाद असावा.

३) सर्वांनी एक वेळेस तरी एकत्र जेवावे

४) जेवताना आनंदी विषय बोलावेत

५) घरात हास्य विनोद असावेत.

६) एकमेकांशी सुसंवाद असावा

मुलांना ताणा मधून बाहेर कसे यायचे ते शिकवणे

१) हे शिकवणे न कळत व्हायला हवे.

२) त्या साठी कोणतीही गोष्ट मुलांनी प्रथम घरात सांगण्यासाठी त्यांच्या मनात विश्वास निर्माण करायला हवा.

३) मुलांशी मोकळे पणाने संवाद साधावा.

४) कोणत्याही परिस्थितीत मी तुझ्या सोबत आहे हा विश्वास त्यांना द्यायला हवा.

अभ्यास विषयक मानसिकता बदलणे

१) मोठ्या माणसांनी टीव्ही,मोबाईल किंवा अन्य गोष्टी बघत “तू अभ्यास कर” असे मुलांना सांगणे टाळावे.

२) आपण अभ्यास करु असे म्हणावे.

३) अभ्यासातून मधे ब्रेक द्यावा.थोडा वेळ खेळू द्यावे किंवा आवडीची गोष्ट करु द्यावी.

मुलांना मोकळे पणाने बोलण्याची संधी द्यावी.

म्हणजे ते त्यांच्या भावना विचार व्यक्त करु शकतील.व त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होईल.

मुलांप्रती प्रेम व्यक्त करणे

प्रेम तुमच्या मुलांना कधीच बिघडवत नसते तर त्यांना चांगल माणूस होण्यास मदत करते. जर तुमचे तुमच्या मुलावर प्रेम असेल तर ते मुलाला दाखवा. त्याच्यासमोर ते व्यक्त करा. जेणेकरून तुमच्या मुलांना हे समजेल आणि पुढे जाऊन याची त्याला जाणीव होईल. आपल्या मुलावर प्रेम करणे, त्याला मिठी मारणे, त्याच्यासोबत वेळ घालवणे आणि दररोज त्यांच्या समस्या गांभीर्याने ऐकणे इतके सोपे असू शकते. यामुळे मुलांच्या शरीरात ऑक्सिटोसिनसारखे फील-गुड हार्मोन्स वाढतात आणि यामुळे त्यांना आनंदी आणि सकारात्मक माणूस बनण्यास मदत होते.

मुलांना समाजिक राहण्यास मदत करणे

मुलांच्या मानसिक विकासासाठी तुम्ही त्यांना सामाजिक राहण्यास सांगणे आवश्यक आहे. यासाठी त्यांची लोकांशी ओळख करून द्या आणि त्यांच्याशी बोलायला शिकवा. त्यांना त्यांच्या मित्रांसमोर आणि नातेवाईकांसमोर मोकळेपणाने वागायला शिकवा. तसेच त्यांना बाहेरची कामे करू द्या. यामुळे ते बाहेरील लोकांशी मोकळेपणाने वागायला शिकतील आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही वाढेल. अशा प्रकारे ते सामाजिकदृष्ट्या मजबूत बनतील.

त्यांच्या समस्या त्यांना सोडवू द्या

मुलांना त्यांच्या समस्या स्वतः सोडवू द्या.

यामुळे मुलांमध्ये सकारात्मक बदल अनुभवायला मिळतात. मुलांना त्यांना त्यांच्या परिस्थितीला स्वतःहून सामोरे जाण्यास शिकवा. याचा सकारात्मक बदल तुम्हाला पाहायला मिळेल.

यानंतर त्यांच्यासमोर कोणतीही समस्या आली तर ते मानसिक आजारी होणार नाहीत, तर समस्या समजून घेऊन त्याशी लढा देतील.

मुलांना शॉपिंगला न्यावे

हे सध्या बऱ्याच घरात होते.पण जे करत नसतील त्यांनी जरुर सुरुवात करावी.मोठ्यांच्या किंवा घरातील वस्तू घेताना सुद्धा त्यांचे मत विचारावे.

अशा काही गोष्टी करुन मुलांमधील आत्मविश्वास वाढवू.व त्यांना मानसिक सशक्त होण्यास मदत करु.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

हिलिंग, मेडिटेशन मास्टर, समुपदेशक.

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “जागतिक पोस्ट दिन निमित्त: (09ऑक्टोबर)…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “जागतिक पोस्ट दिन निमित्त: (09ऑक्टोबर)…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

जन्मच मुळी नोकरदार कुटुंबात झाल्याने नोकरी ह्या क्षेत्रातील विवीध खात्यांची ओळख ही लहानपणा पासूनच होती. आई मुख्याध्यापिका त्यामुळे शैक्षणिक क्षेत्र आणि बाबा सहकार खात्यात असल्याने ह्या दोन्हीं खात्यांना जवळून अभ्यासता आल. बरेचं वेळा आपल्याला कागदावरील अगदी छोटासा काळा ठिपका चटकन दिसतो पण अख्खा पांढरा कागद मात्र आपल मन, डोळे, बुध्दी विचारतच घेत नाहीत. तसच ह्या नोकरदार खात्यांमधील बारीक त्रुटी आपण उगाळत बसतो पण ह्या क्षेत्रांत होणाऱ्या मोलाच्या मदतीच्या गोष्टी आठवत नाहीत.शिक्षणं खात आणि सहकार खात हयाचबरोबर आईची पोष्टाची एजंसी असल्याने पोस्ट खात पण खुप जवळून अभ्यासता आल.   

पूर्वी नं घरोघरी विशिष्ट कामं करायला काही नेमलेली मंडळी असत, सहवासाने वा नित्यभेटीने ह्या मंडळींशी आपलं तसं बघितलं तर कुठलही नातं नसायचं पण ह्या मंडळींशी आपले भावनिक बंध जुळल्या जाऊन त्यांच्या बद्दल आत्मियता, घरोबा हा आपसूकच निर्माण व्हायचा. त्या मंडळींमध्ये प्रामुख्याने उल्लेख करता येईल असे आपले पोस्टमनकाका असायचे. आज जागतिक टपाल दिन.टपाल खात्याप्रती आणि पोस्टमनकाकांप्रती असलेल्या आदरामुळे आजचा हा लेख त्यांना अर्पण.

पोस्टमनकाका म्हंटले की आठवते ती त्यांची कायम खाकीवर्दीतील हसरी,बोलकी आणि तडतडी मुर्ती. ऋतु कुठलाही असो ह्या पोस्टमनकाकांची आणि टपालखात्याची सेवा निरंतरच. अजूनही आठवतात पावसाळ्यात ओलेगच्च होऊन पण टपाल भिजू नये म्हणून प्लँस्टीकच्या पिशवीत जिवापलीकडे टपाल सांभाळणारे सायकलवर येणारे पोस्टमनकाका, अजूनही आठवतात कडकडीत रणरणत्या उन्हात आम्ही सगळे दुपारी पत्ते खेळत असतांना घामाघूम होऊन येणारे पोस्टमनकाका

गार पाणी सुद्धा बाहेर उभे राहून पिणारे कारण आत आलो तर पंख्याचं वारं बाधून ताप येईल म्हणणारे पोस्टमनकाका. खरचं ह्या खात्याच्या सेवेला मनापासून सँल्युट. कदाचित नवीन तंत्रज्ञानामुळे आजच्या पिढीला ही सेवा,हे जुळलेले भावनिक बंध उमगणार पण नाहीत.

नवीन नोकरीचे नेमणूकपत्र आणणारे, कुणाच्या नात्यात बाळं जन्माला आलं की खबरबात घेउन येणारे काका घरच्यासारखे आपल्या आनंदात सहभागी व्हायचे आणि नात्यातील कुणी गेल्याची तार घेऊन येणारे पोस्टमनकाका घरचीच व्यक्ती असल्यागत धीर वा सांत्वन करायचे.

लहानपणी खरतरं पोस्ट खातं म्हणजे फक्त तार,मनीआँर्डर, पत्र पोहोचवणारं खातं एवढचं समजायचं.पण जसाजसा काळ गेला, समज आली तेव्हा ह्या खात्याचा प्रचंड मोठा आवाका,काम बघून ह्यांच्याप्रती आदर अजूनच दुणावला. पुढे माझ्या आईने पोस्टाची एजन्सी घेतली.आर.डी,एन.एस.सी,के.व्ही.पी,पी.पी. एफ ह्या योजना डोक्यात शिरल्या. ह्या खात्यानेच जणू आम्हा भावंडांना आई करीत असलेलं काम बघून भविष्यात करायची तरतूद, काटकसर,नियोजन आणि सगळ्यात महत्वाची थेंबे थेंबे तळे साठे ही म्हण समजवणारी बचत ह्या गोष्टींचं अपरंपार महत्त्व अगदी लहानपणीच समजावीलं आणि त्याचा फायदा अजूनही आम्हाला होतोय.

भारतात कारभाराच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर पसरेलेल्या जाळ्यांमध्ये प्रामुख्याने रेल्वे सेवा,टपाल सेवा ह्याचा उल्लेख करावाच लागेल. भारतीय टपाल सेवा ही भारतातील सरकारच्या टपाल खात्यामार्फत इंडिया पोस्ट या नावाने चालवली जाते. देशाच्या दूरवरच्या आणि पोहोचायला अत्यंत अवघड भागात सुद्धा ही टपालसेवा पोहोचली आहे. भारतामध्ये पहिल्या टपालाच्या तिकिटांची सुरुवात सिंध जिल्ह्यामध्ये1852 मध्ये झाली तर 1854 पर्यंत सगळीकडे एका प्रकारच्या तिकिटांचे प्रचलन सुरू झाले.भारतामध्ये पहिले टपाल तिकीट 1931 साली छापले गेले. त्यानंतर पहिले स्वातंत्र्योत्तर तिकीट 1947 मध्ये निघाले आणि त्यावर भारतीय झेंडा छापण्यात आला.

बचतीच्या बरोबरीने विकास साधण्यासाठी कर्जाचे महत्त्व जाणून भविष्यातील काळाची पावलं ओळखून ह्या टपाल खात्याने “बँकींग सेवा”पण सुरू केलीयं.

ह्या खात्याचे मला स्वतः ला खूप चांगले अनुभव आलेत. यवतमाळ ला सुदधा ह्या खात्यातील कर्मचाऱ्यांनी व्यवहारीक बाजू समजावून सांगून खूप सहकार्य केलं. माझे सासरे पोस्ट खात्याचे कर्मचारी होते. त्यामुळे ति.आईंना पोस्ट खात्याची पेन्शन मिळते. आधी यवतमाळ चे पोस्ट आँफीस,ह्या खात्यातील आँडीट सेक्शन आणि आता बडनेरा पोस्ट खात्यातील कर्मचारी ह्यांची मोलाची मदत आणि तत्पर सेवा आम्हाला वेळोवेळी मिळाली आणि अजूनही मिळते आहेच.त्यामुळे ह्या खात्याच्या समस्त कर्मचाऱ्यांना जागतिक टपाल दिना निमीत्ताने धन्यवाद देऊन ह्या खात्याची सेवा आपल्यासाठी खरोखरच गौरवास्पद आहे हे जाणून आजच्या पोस्टची सांगता करते.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उमज पडेल तर…! ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

उमज पडेल तर…! ☆ श्री अरविंद लिमये ☆

‘तुमची सतत सोबत करणारा तुमचा खरा साथीदार कोण?’ असा प्रश्न आपल्याला कुणी विचारला तर  आपण कांही क्षण गोंधळून जाऊ. प्रश्न ऐकताच मनात निर्माण झालेल्या संभाव्य उत्तरांपैकी आई, बाबा, भाऊ, बहीण, पत्नी, मुलं, मित्र यापैकी कुणाचे नाव घ्यावे हा संभ्रम आपल्याला गोंधळात टाकेल.पण ‘खऱ्या अर्थाने आपला साथीदार म्हणावं असं यापैकी कुणीच असू शकत नाही’ हा विचार मात्र या वैचारिक गोंधळात  आपल्या मनातही येणार नाही. कारण खऱ्या अर्थाने साथीदाराची भूमिका निभावणाऱ्यांचं योगदान आपल्या खिजगणतीतही नसतं!

आपल्या पहिल्या श्वासापासून अखेरच्या श्वासापर्यंत प्रत्येक क्षणी आपल्याला साथ देणारं, आपली सोबत करणारं, एकाच नाण्याच्या दोन बाजू असाव्यात असं कुणी असेल तर ते म्हणजे आपलं शरीर आणि आपलं मन !!

जन्मतः हातीपायी धड शरीर आणि आपलं जगणं सजग करणारं मन दोन्हीही सक्षम,निरोगी,स्वयंपूर्ण राखण्याची जबाबदारी अर्थातच आपलीच असते. मात्र ही जबाबदारी जाणीवपूर्वक पार पाडणारे अपवादात्मकच असतात एवढं खरं. पूर्णतः स्वावलंबी असण्यासाठी निरोगी शरीर आणि खंबीर मन या अत्यावश्यक गोष्टी,पण स्वावलंबी असण्यातलं सुख परावलंबित्व येतं तेव्हाच समजतं याचं काय करायचं?

खरंतर माणसाला विनामूल्य, अगदी सहज जे उपलब्ध होतं त्याची किंमतच नसते याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आपलं शरीर आणि मनच! या दोन्हींची सक्षमता जगणं आनंदी करण्यासाठीची आपली मूलभूत गरज आहे याची आपल्याला जाणीवच नसते आणि ती होते तेव्हा बराच उशीर झालेला असतो.असं होऊ नये म्हणून आपल्या शरीरमनाला संजीवनी देणारा एक परवलीचा जादुई शब्द आहे. त्याचा अर्थ न् आवाका आपण समजून घ्यायलाच हवा.

सहजासहजी न मिळणारं पण सातत्यपूर्ण प्रयत्नांती ‘ देता घेशील किती दोन कराने’ असा चमत्कार घडवू शकणारा संजीवक मंत्रच भासावा असा हा सामर्थ्यवान शब्द म्हणजे ‘ बल’!

हा शब्द ऐकताच तो मुख्यत: शरीराशी संबंधित असावा असंच वाटतं याचं कारण या शब्दाचे ‘शक्ती’ आणि ‘सामर्थ्य’ हे सर्रास रुढ असणारे अर्थ.तरीही या दोन्ही अर्थांनाही इतका मर्यादित संदर्भ मात्र अपेक्षित नाहीय.शक्ती आणि सामर्थ्य हे शब्द केवळ बळकट, सशक्त, भक्कम शरीराचेच नव्हेत फक्त तर धैर्यशील,खंबीर,कणखर मनाचेही निदर्शक आहेत.

प्रतिकारशक्ती, अंगबळ, बाहुबळ, वकूब, बलाढ्य,बलवान,बलवंत, बलशाली,बलदंड,या शरीरबलाशी संबंधित अर्थसावल्या जशा तशाच मनोबल, सहनशक्ती, मन:शक्ती, इच्छाशक्ती, विचारशक्ती या आहेत मनाशी संबंधित!

शरीर आणि मनाच्या सक्षमतेला बुद्धिबलाची जोड नक्कीच पूरक ठरते.

आध्यात्मिक उन्नतीव्दारे प्राप्त होणाऱ्या बलाची प्राणशक्ती,तपोबल, तपसामर्थ्य, आत्मशक्ती ही कांही शब्दरुपे.

खरंतर शरीरबल असो वा मनोबल ते संकटाशी दोन हात करायचं सामर्थ्य देतात.ती संकटाचं निवारण करायला समर्थही असतात.पण हेच सामर्थ्य समोरचा प्रतिस्पर्धी जर कमकुवत असेल तर त्याला मात्र अस्मानी संकटच वाटतात.बलातूनच निर्माण होणारा ‘बला’ हा शब्द अशा भयप्रद संकटासाठीच वापरला जातो.

स्त्रीचा उल्लेख अनेकदा बल नसलेली, कमकुवत याअर्थी अनेकदा ‘अबला’ असा केला जातो. तरीही स्त्री खऱ्या अर्थाने अबला नसून सबला असल्याची असंख्य उदाहरणे आहेत जी ‘नारीशक्ती’चीच द्योतक ठरतात!

सामर्थ्याचा नकारात्मक,विध्वंसक वापर अधोरेखित करणारे पाशवी शक्ती,बलात्कार यासारखे शब्द स्वतःच त्यातली नकारात्मकता,कुरुपता ठळक करणारे आहेत.

शारीरिक बळ आणि मनोबल ही खरंतर निसर्गदत्त वरदानंच‌.माणसाने ती ओळखणं,जपणं,वृध्दिंगत करणं आणि त्याचा सकारात्मक वापर करणं हेच निसर्गाला अपेक्षित आहे. मात्र याचा विसर पडल्याचे सर्रास वास्तव मात्र कणाकणाने  माणसालाच हळूहळू नि:शक्त करीत ‘हतबल’ करणारे ठरते आहे याचे भान हरवून चालणार नाही. पण..? उमज पडेल तर..!!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्वागत… ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

स्वागत…  ☆ सौ.मंजिरी येडूरकर

एका उदास संध्याकाळी आकाशाला फार रितं रितं वाटत होतं. सारखं कुणीतरी यावं, कुणीतरी यावं असं वाटायला लागलं. म्हणून त्यानं स्वागताची भव्य तयारी केली सुरू केली. इंद्रधनूची सप्तरंगी कमान उभी केली, पायवाटेवर लाल मखमल अंथरली पण कुणी आलंच नाही. त्याला वाटलं आपण या सजावटीसाठी एवढे कष्ट केले, इतकी सुंदर रांगोळी  पण घातली तरी कोणी का आले नाही? तो सूर्य किंवा चंद्र कोणाला तरी जबरदस्तीने घेऊन यावं  का? पण जर जबरदस्तीनं आणलं तर हे उदास वातावरण तसंच राहील. त्याच्या लक्षात आलं कि कुणीतरी यावं असं वाटणं हे अर्थशून्य आहे. कुणाला तरी यावं असं वाटणं हेच जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे आपल्या तयारीचा काही उपयोग नाही. अखेर सगळी स्वागताची तयारी त्यानं गुंडाळून ठेवली आणि खिन्नपणे बसून राहीला. थोडया वेळाने एक एक करत तारे आले. तारकां आल्या सारं आकाश त्यांच्या चमचमाटानं भरून भारून गेलं. वारा ही मग इकडून तिकडे, तिकडून इकडे पळापळा करू लागला. खिन्न असलेलं वातावरण क्षणात आल्हाददायक झालं. आकाशाला कळेना, अरे! कुणी कमान कां उभी केली नाही म्हणून विचारलं नाही, कुणी गालीचा कां अंथरला नाही म्हणून थांबलं नाही. कुणाला या ही म्हणावं लागलं नाही. म्हणजे कुणाला तरी यावं असं वाटणं महत्त्वाचं असतं. मग त्याच्या मागून उल्हास आपोआप येतो. स्वागत करणाऱ्यांकडे उल्हास  आला कि येणारे आनंद घेऊनच येतात. अशावेळी स्वागताची सजावट हा फक्त उपचार असतो.

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गाये लता, गाये लता, गाये लता गा! भाग -२ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

☆ गाये लता, गाये लता, गाये लता गा! भाग -२ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

(…अशी ही किती म्हणून लताच्या मधुमधुरा स्वरमाधुरीची बहुरंगी स्त्रीरूपे आठवावीत?)

लताने गायलेली माझी आवडती गाणी आठवण्याचा प्रयत्न केला असता, हातातून बहुमोल मोती घरंगळून जावेत असेच होत होते. त्यातील कांही पेश करायचा मोह अगदीच आवरत नाही. मला लताचा १९५० ते १९५५ चा अगदी कोवळा आवाज फारच प्रिय आहे. म्हणून गाणी तशीच… ‘उठाए जा उनके सितम’ – (चित्रपट – ‘अंदाज’, १९४९, मजरूह सुल्तानपुरी – नौशाद), ‘सीने में सुलगते हैं अरमाँ’ – (चित्रपट – ‘तराना’, १९५१, प्रेमधवन – अनिल बिस्वास), ‘साँवरी सूरत मन भाई रे पिया तोरी’ – (चित्रपट – ‘अदा’, १९५१, प्रेमधवन – मदनमोहन), ‘ये शाम की तनहाइयाँ’ – (चित्रपट – ‘आह’, १९५३, शैलेन्द्र – शंकर जयकिशन), ‘जाने वाले से मुलाकात ना होने पायी’ -(चित्रपट – ‘अमर’ – १९५४, शकील बदायुनी – नौशाद). अर्थात प्रत्येकाच्या आवडीला कांही परिमाण नाही हेच खरे!

कानांत प्राण एकवटून ऐकत राहावे असे हे आनंदघन बरसतात अन मन चिंब होते, कितीही भिजले तरी परत ते मखमली अन नर्म मुलायम स्वरतुषार झेलावेसेच वाटतात. अमृतलता असेल तर जितके अमृतपान करा, तितकी अतृप्ती वृद्धिंगत होतच जाते. मित्रांनो! ही अतृप्ती शाश्वत आहे, कारण लताचा ॐकारस्वरूपी स्वरच मुळी चिरंतन आहे, त्याचे अनादी अनंत रूप अनुभवल्यावर स्वाभाविकपणे वाटते, ‘दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती!’ मला आचार्य अत्रेंचे लताविषयीचे एक वाक्य फार आवडते, ‘सरस्वतीच्या वीणेचा झंकार, उर्वशीच्या नुपूरांची रुणझुण नि कृष्णाच्या मुरलीचा नाद, हे सर्व एकवटून विधात्यानं लताचा कंठ घडविला असला पाहिजे.’ 

आचार्य अत्रे यांनीच लताला २८ सप्टेंबर १९६४ साली (अर्थात तिच्या वाढदिवशी) ‘दैनिक मराठा’ या त्यांच्या वृत्तपत्रात अजरामर झालेले असे त्यांचे मानपत्र अर्पण केले होते! संपूर्ण लेखच वाचनीय आहे, पण त्याची झलक म्हणून लताच्या अद्भुत, अनमोल अन अनुपम स्वराविष्काराचे वर्णन करतांना अत्र्यांनी किती नाजूक आणि मखमली शब्दांची आरास उभारली आहे बघा, ‘स्वर्गीय स्वरमाधुर्याचा मूर्तिमंत अवतार असलेल्या लताचे केवळ लोखंडाच्या निफातून उतरलेल्या शाईच्या शब्दांनी, वृत्तपत्राच्या जाड्याभरड्या कागदावर, अभिनंदन करणे म्हणजे स्वरसम्राज्ञीच्या स्वागतासाठी तिचा चरणाखाली जाड्याभरडया गोणपाटांच्या पायघड्या अंथरण्याइतकं विशोभित आहे. लताच्या कंठातील अलौकिक कोमलतेला साजेसं अभिवादन करायचं तर त्यासाठी प्रभातकाळची कोवळी सुवर्णकिरणं दवबिंदूमध्ये भिजवून बनवलेल्या शाईने, कमलतं तूच्या लेखणीने आणि वायूलहरीच्या हलक्या हातानं, फुलपाखरांच्या पंखावर लिहिलेलं मानपत्र गुलाबकळीच्या करंड्यातून तिला अर्पण करायला हवं!’

इतके मानसन्मान, प्रसिद्धी, ऐश्वर्य आणि चित्रपटसृष्टीतला झगमगाट हे सर्व असूनही तिचा रियाज चुकला नाही अन पाय जमीनीवर होते ते तिथंच राहिले. जागतिक कीर्तीच्या प्रतिष्ठित अल्बर्ट हॉल मधील तिला आंतरराष्ट्रीय गायिका म्हणून प्रस्थापित करणाऱ्या कार्यक्रमाची तारीफ करावी की, सर्वश्रेष्ठ असे दादासाहेब फाळके अन भारतरत्न पुरस्कार मिळाले तरी लताची विनम्रता कमी कशी झाली नाही याचे नवल करायचे?

स्वरलता या विषयावर रकान्यांवर रकाने, ऑडिओ, विडिओ, पुस्तके, सर्व कांही भरभरून उपलब्ध आहेत. पण आपण सागराला त्याच्याच जलाने अर्ध्य देतो ना, तसेच माझे हे अर्ध्य आहे! या स्वरदेवतेने स्वरसुमने भरभरून दिलीत! ‘घेता किती घेशील दो कराने’ अशी अवस्था झालीय, ओंजळ कवाच भरली फुलांनी, डोळे बी भरले पाण्यानी, अन हृदय भरलं ‘हृदया’ च्या (लताचे हे नाव मला अतिप्रिय) स्वरमौक्तिकांनी! आता ‘हेचि दान देगा देवा’ की, फक्त लताचा निर्मोही, निरंकारी अन निरामय स्वर असावा, तिच्या सप्तसुरांच्या चांदण्यांच्या पायऱ्या चढत जावे आणि पारलौकिक संगीतअवकाशातील ध्रुव ताऱ्यासमान चमकणारी आमची लाडकी स्वरलता अनुभवावी फक्त तिच्या स्वरलहरींतून, अगदी याचि देही अन याचि जन्मी!  प्रिय वाचकांनो, ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ अशा लताच्या स्वराविष्काराला तूर्तास विराम देऊन या अजरामर स्वरशारदेच्या चरणी नतमस्तक होते!

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गाये लता, गाये लता, गाये लता गा! भाग -१ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

☆ गाये लता, गाये लता, गाये लता गा! भाग -१ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

२८ सप्टेंबर १९२९ चा अत्यंत मंगलमय दिवस! या दिवशी घडलेली ‘न भूतो न भविष्यति’ अशी घटना! गंधर्वगायनाच्या पल्याड असलेले ‘लता मंगेशकर’ नामक सात अक्षररुपी चिरंतन स्वरविश्वाचे मूर्तरूप जन्माला आले.  अक्षय परमानंदाची बरसात करणारी स्वरशारदा लता आज संगीताच्या अक्षय अवकाशात ध्रुव ताऱ्यासारखी अढळपदी विराजमान झाली आहे. तिचे सूर अवकाशात असे कांही विखुरलेले आहेत की, ती या नश्वर जगात नसल्याचे जाणवतच नाही. ‘शापित गंधर्व’ दीनानाथ मंगेशकरांचा वारसा घेऊन लता आयुष्याचा प्रत्येक क्षण काटेरी वाटचाल करीत संगीताला समर्पित करूनच जगली. एखादी मूर्ती घडत असतांना टाकीचे घाव सहन करते, तसेच तिच्या आयुष्याची सुवर्णसांगता होण्याआधी तिने अगणित घाव सहन केले.  तिच्या संगतीने काम करणाऱ्या गायक, संगीतकार, गीतकार, सिनेसृष्टीतील अनेक व्यक्ती आणि बाबासाहेब पुरंदरे तसेच गो नी दांडेकरांसारख्या दिग्गजांच्या सहवासाने तिच्या व्यक्तिमत्वाला अन मखमली स्वरांना दैवी सुवर्णकांती प्राप्त झाली. लता आयुष्यभर एक अनोखी अन अनवट सप्तपदी चालली, सप्तसुरांबरोबर! 

मंगेशकर भावंडे म्हणजे आजच्या भाषेत मी म्हणेन, ‘मंगेशकर ब्रँड’ याला अन्य नसे उपमान! अन्य नसे पर्याय! दीनानाथ आणि माई (शेवंती) मंगेशकरांचे हे पंचप्राण होते, प्रत्येकाचा गुणविशेष निराळा.             लताच्या या साफल्याचे रहस्य होते लहानपणापासून आपल्या पित्याकडून, अर्थात मराठी संगीत नाटकांचे प्रसिद्ध गायक अभिनेता ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर’ यांच्याकडून वारसाहक्काने आणि शिक्षणातून आलेली संगीतविद्या, तिची स्वयंस्वरप्रज्ञा आणि कठोर स्वरसाधना! अजाणत्या वयापासूनच लताचे हे संगीतज्ञान तिच्या पिताला जाणवले होते. तेव्हांपासूनच त्यांनी तिच्या गायकीला समृद्ध केले. वयाच्या सहाव्या वर्षापासूनच ती रंगमंचावर गायला लागली. १९४२ मध्ये त्यांचा अकाली मृत्यु झाला तेव्हां लता केवळ १३ वर्षांची होती. या कोवळ्या वयापासूनच ती भावंडांचा आधारवड झाली! संघर्षांची मालिका समोर होती, पण त्यांतूनच तिने हे काटेरी मार्गक्रमण केले.

प्रथम प्रसिद्धी मिळाली ती ‘महल'(१९४९) चित्रपटातील ‘आएगा आने वाला’ या गाण्याला! तेव्हा लता वीस वर्षांची होती आणि या चित्रपटाची नायिका मधुबाला होती सोळा वर्षांची. या चित्रपटामुळे या दोघींची कारकीर्द बरोबरच बहरली, एक स्वरसम्राज्ञी अन दुसरी सौंदर्यसम्राज्ञी! गंमत म्हणजे या गाण्याच्या रेकॉर्डप्लेअरवर गायिका म्हणून नाव होते ‘कामिनी’ (तेव्हा रजतपटावर गाणे साकार करणाऱ्या पात्राचे नाव लिहीत असत)! नंतर लतानेच संघर्ष करून रेकॉर्डप्लेअर वर नावच नव्हे तर रॉयल्टी, तसेच गायक गायिका यांना वेगवेगळे फिल्मफेअर पुरस्कार इत्यादी मिळवून त्यांना त्यांचे श्रेय मिळवून दिले! लता आणि सिनेसृष्टीची अमृतगाथा समांतर म्हणायला हरकत नाही. १९४० पासून ते अगदी २०२२ पर्यंत जवळपास ८० वर्षांची असलेली ही सांगीतिक सोबत. तिच्या सोबतचे गायक, गायिका, नायक, नायिका, संगीतकार, गीतकार, तंत्रज्ञ, वादक, दिग्दर्शक, निर्माते असे हजारोंच्यावर लोक तिच्या बरोबर मार्गक्रमण करते झाले, कोणी अर्ध्या वाटेवर सोडून गेलेत. आता तर तीही त्यांच्या सोबत गेली आहे. आता हा स्वरामृताचा वेलू गगनाला भिडलाय!

आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिचं गाणं इतकं ऐकलं तरी असं कां होतं? ‘अगंबाई, अरेच्चा, हे सुंदर गाणे आजवर ऐकले कसे नाही! आई शप्पथ, हे असं कसं मिस झालं!’ मंडळी, ही कथा प्रत्येक रसिकाचीच असावी, इतके हे स्वरभांडार विशाल आहे. आणिक एक वेगळीच गंमत आहे हिच्या जादुई स्वरांत! ऋतूबदलाप्रमाणे आपल्या बदलत्या मूडनुसार आपल्यासाठी लताच्या आवाजाचे पोत बदलल्याचा आपल्याला भास होतो. खरे पाहिले तर एकदा ऐकून हा स्वरानंद आपल्या हृदयात झिरपत नाही असे असावे! बघा ना, आज जर माझा मूड ऑफ आहे, तर या अमुक गाण्यात लताचा आवाज मला जास्तच शोकविव्हल लागलाय असा फील येतो. काय म्हणू या बहुरंगी, बहुढंगी, फुलपाखरी आवाजाच्या कळांना, या स्वरांबद्दल बोलायचे तर संत तुकारामांची रचना आठवली, ‘कमोदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगीतसे’! तिला काय माहिती की, तिने आमचे आयुष्य किती अन कसे समृद्ध केले ते! तिच्या आवाजाने समृद्ध झालेल्या ३६ भाषांपैकी कुठली बी भाषा असू द्या, या एकाच आवाजात ती भाषाच धन्य होईल अशी गाणी, एकदम ओरिजिनल लहेजा आणि स्वराघात! लता तू वरून काय घेऊन आलीस अन इथे काय शिकलीस, याचा अचेतन हिशोब करणे म्हणजे तारे मोजण्यापेक्षा दुष्कर. त्यापेक्षा सच्च्या रसिकांनी एक ऍटिट्यूड (वर्तमान संदर्भात नव्हे) ठेवावा, ‘आम खाओ, पेड मत गिनो’. फक्त तिच्या गाण्यावर फिदा व्हायचे, की विषय तिथंच आटोपला!

तिने दयाबुद्धीने कांही प्रांत अगदी तिच्या आवाक्यात होते तरी सोडले, शास्त्रीय संगीत अन नाट्यसंगीत. (यू ट्यूब वर आहेत मोजके)! दत्ता डावजेकर यांनी नमूद केल्याप्रमाणे जिच्या नांवातच लय आणि ताल आहे, जिच्या गाण्याने ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ निर्माण होतात, जिने ‘आनंदघन’ या नावाने मोजक्याच (चार) चित्रपटांना संगीत देऊन तमाम संगीतकारांवर उपकार केलेत, जिने शास्त्रीय संगीताचे उच्चशिक्षण घेऊन, त्यात प्राविण्य संपादून देखील व्यावसायिकरित्या शास्त्रीय संगीताच्या बैठकी सजवल्या नाहीत (प्रस्थापित शास्त्रीय गायकांनी देखील तिचे याकरता जाहीररीत्या आभार मानलेले आहेत!), तिच्याबद्दल संगीतकार वनराज भाटिया म्हणतात, ’she is composer’s dream!’ कुठल्याही संगीतकाराची गाणी असोत, खेमचंद प्रकाश, नौशाद, अनिल बिस्वास, ग़ुलाम मोहम्मद, सज्जाद हुसैन, मदनमोहन, जमाल सेन यांच्यासारख्या दिग्गजांची कठीण चालींची, सलिलदा किंवा सचिनदांच्या लोकसंगीतावर आधारित असलेली, वसंत देसाई, सी. रामचंद्र, रोशन अन शंकर जयकिशन यांच्या अभिजात संगीताने नटलेली, की आर डी, ए आर रहमान, लक्ष्मी प्यारे, कल्याणजी आनंदजीची आधुनिक गीते असोत, त्या गाण्याला लताचा परीसरुपी स्वरगंधार लाभला की, त्याची झळाळी नवनवीन सुवर्ण उन्मेष घेऊन रसिकांच्या कलेज्याचा ठाव घ्यायची. अतिशय कठीण अन घनगंभीर चाली रचून लताकडून असंख्य रिहर्सल करून घेणारा संगीतकार सज्जाद हुसैन तर म्हणायचा, ‘फक्त लताच माझी गाणी म्हणू शकते!’

ही स्वरवल्लरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलपेक्षा वरचढ! कुठलाही रोग असू देत, हिच्याजवळ गाण्याच्या रूपात औषध हाजिर है! बरे यात ‘औषध मजला नलगे’ चे बहाणे अजिबात चालायचे नाहीत. लहान मुलीचे ‘बच्चे मन के सच्चे’, १६ वर्षांच्या नवयौवनेचे ‘जा जा जा मेरे बचपन’, विवाहितेचे ‘तुम्ही मेरी मंजिल’, समर्पितेचे ‘छुपा लो यूं  दिल में प्यार मेरा’, तर एका रुपगर्वितेचे, ‘प्यार किया तो डरना क्या’, एका मातेचे ‘चंदा है तू’, एका क्लब डांसरचे (आहे मंडळी) ‘आ जाने ना’ एका भक्तिरसाने परिपूर्ण अशा भाविकेचे, ‘अल्ला तेरो नाम’, एका जाज्वल्य राष्ट्राभिमानी स्त्रीचे, ‘ऐ  मेरे वतन के लोगों’! अशी ही किती म्हणून लताच्या मधुमधुरा स्वरमाधुरीची बहुरंगी स्त्रीरूपे आठवावीत? 

क्रमशः…

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मुली असाव्यात!… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

मुली असाव्यात!… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सहजच गप्पांचा, चर्चेचा फड रंगला की बायकांचे किंवा पुरुषांचे एक वाक्य ऐकायला येते, “एखादी मुलगी असावीच बघा. ” मलाही दोन मुलेच आहेत मग कुणीपण म्हणते, “मुलगी एक हवी होती बघा!”पण मी म्हणते का?मुलीला माया असते, अमुक तमुक… म्हातारपणी एखादे विसाव्याचे ठिकाण असावे.. वगैरे. पण खरेच असे असते का? मुली प्रेमळ असतात न मुले नसतात, हा शोध कुणी लावला?(माझी दोन्ही मुले प्रेमळ आहेत आणि आईच्या सेवेसाठी तत्पर असतात)असे कोणतेच विधान सरसकट करता येत नाही. मुली प्रेमळ, मुले कठोर, किंवा मुली सेवा करतात, मुले टाकून देतात.. खरे तर व्यक्ती परत्वे स्वभाव, संस्कार भिन्न असतात. अमुक एक जात, पंथ, धर्म चांगला/वाईट असे काहीच नसते, प्रत्येक जाती, धर्म पंथात वेगवेगळ्या आचार विचार आणि स्वभावाची माणसे असतातच.

तसेच आपल्या अपत्याबाबत देखील असते. मुळात आपल्या म्हातारपणी काठी व्हावीत, आपली सोय व्हावी म्हणून मुले जन्माला घालणे चूक आहे. मनुष्य हा प्राणी आहे आणि तो आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्यासारखाच दुसरा प्राणी किंवा जीव निर्माण करतो. समाज टिकवण्यासाठी एका जिवातून दुसरा जीव तयार होतो. मुलांचे पालन पोषण नीट करून सुसंस्कृत बनवून त्यांना सशक्त सुदृढ बनवणे व एक बलशाली राष्ट्र बनवणे हे प्रत्येक पालकांचे आद्य कर्तव्य आहे. तसेच त्याला त्याच्या कलेने  योग्य ते शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करणे, स्वावलंबी बनवणे हेही कर्तव्य आहे. हे करत असताना स्वतःही स्वतःसाठी जगत, स्वत:बरोबर कुटुंबाला वेळ देणे, मुलांना वेळ देणे आणि मुलं सज्ञान झाली की आपण आपण वानप्रस्थाश्रम याचा अर्थ स्वतःचे उर्वरित पूर्ण  आयुष्य समाधानात, आनंदात घालवणे ही आजच्या काळातील अतिशय महत्वाचे आहे. पण हे घडताना दिसते अतिशय दुर्मिळ. उलट ‘आम्ही तुला लहानाचे मोठे केले, ‘यावं त्यांव करून पालक सतत पाल्याभोवती भुण भुण लावतात, जेष्ठ झाल्यावर तर अजूनच जास्त.

याच्या विरुद्ध पालक कितीही चांगले वागले तर मुले त्यांना समजून घेण्याच्या मानसिकतेत नसतात आणि अशा पालकांना पण उतारवयात दुःख होते. एकूण मुली आहेत म्हणून आनंदी आनंद आणि मुले म्हणजे दुःखच दुःख असे काहीच नाही. चांगले पालक मिळणे ही जशी भाग्याची गोष्ट असते तशीच मुले चांगली, सद्गुणी निघणे हेही भाग्यावरच अवलंबून आहे असेच चित्र आता सगळीकडे दिसत आहे, कारण भारतीय समाज एका मोठ्या स्थित्यंतराच्या टप्प्यावर आला आहे, यात ग्रामीण, शहरी फरक  राहिला नाही.

परवाच ऐकलेली दोन उदाहरणे सांगते. मुलींनी वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा मिळावा म्हणून आईवडीलांवर केस घातली. वडिलांना मानसिक धक्का बसून अर्धांग झाला. एकुलता एक भाऊ बिचारा खाजगी बसवर चालक म्हणून काम करून कुटुंब चालवत आहे.

दुसरे उदाहरण वडिलांचा वार्धक्याने मृत्यू झालाय. तिन्हीसांज झाली आहे. टिपटीप पाऊस आहे, अंत्ययात्रेला माणसे जमवण्याचा प्रयत्न सुरू आहे, इतक्यात मुलगा दिसत नाही म्हणून शोध घेतला जातो, तासभर शोधूनही तो मिळत नाही(दारू पिऊन कुठल्या कोपऱ्यात पडला होता कोण जाणे!)शेवटी वडिलांवर अंत्यसंस्कार झाले. काय करायची असली मुले-मुली असून?ही फक्त प्रातिनिधिक उदाहरणे आहेत.

आजकाल किती मुली मोठ्या झाल्या की घरची सर्व कामे करून आईला विश्रांती देतात?मी तर म्हणेन हाताच्या बोटांवर मोजण्या इतपतच, उलट शिक्षण चालू आहे तोवर आईच सगळं करते, पुढं नोकरी लागते, लग्न होते मग वर्षभराच्या सर्व बेगमी(चटण्या, उन्हाळी पदार्थ)मुली आईकडूनच करून घेतात. काही मुली राहिलेलं शिक्षण परत माहेरीच राहून पूर्ण करतात आणि आईच सर्व मुलीचे पाहते, घरकाम पाहते. आई आपल्या अपत्यावरील प्रेमाखातर सर्व आनंदाने करते पण मुलीला आपल्या आईबद्दल कणव कधी वाटणार?अशी बरीच उदाहरणे आसपास दिसतात.

सज्ञान झाल्यावर चांगले-वाईट, नैतिक अनैतिक यातला फरक कळण्याची व त्याप्रमाणे आचरण करण्याची व जबाबदारीने वागण्याची जबाबदारी प्रत्येक माणसाची असते. पालक ठराविक वयापर्यंतच आपल्याला मार्गदर्शन करू शकतात तिथून पुढं आपण त्यांनी दाखवलेल्या चांगल्या मार्गावर चालणे अपेक्षित असते, पण असे होत नाही. आज ढवळलेले सामाजिक वातावरण, गढूळ झालेली माणुसकी, यातून निरक्षीर विवेक जागृत ठेवणे फारच जिकिरीचे झाले आहे. यातून जे तरतात, त्यांची कुटुंबे संतुलित आणि आनंदी राहतात बाकी प्रवाहात गटांगळ्या खातात.

असो, पालकांनीच आता मुलांकडून अपेक्षा न ठेवता निरपेक्षपणे मुलांवर प्रेम आणि पालन पोषण केलं तर भविष्यात मुलं आपल्यासोबत प्रतिकूल वागली तर दुःख व पश्चाताप होणार नाही. अन्यथा शेक्सपिअर म्हणतोच, ‘माणसाच्या दु:खास तो स्वतः कारणीभूत असतो.’

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares