मराठी साहित्य – विविधा ☆ नाते… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

 🌸 विविधा 🌸

☆ नाते… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सोशल मीडिया वर त्यांची ओळख झाली.थोड्या जुजबी गप्पातून आवड निवड जुळली.तिला माहिती होते,अशा ओळखी होतात थोडा वेळ राहतात आणि गायब होतात जणू सशाच्या डोक्यावरचे शिंग.म्हणून तीही कुठे अडकत नव्हती.जपून बोलत होती.

एक दिवस तो तिला भेटला.ती अंतर ठेवून वागते हे त्याच्या लक्षात आले होते.ती अनुभवाने शहाणी किंवा सडेतोड वागणारी झालेली. तर तो फार हळवा प्रत्येक गोष्ट तिला सांगणारा अगदी मना पासून कोणतेही नाते निभावणारा.तसा तो पारदर्शक वाटत होता.तसे वागतही होता.पण हिच्या मनात एकच प्रश्न आपले नाते काय? तो म्हणे सगळ्याच नात्यांना नाव का द्यायचे?नाते फुलू द्यायचे.म्हणजे नाते आपोआप तयार होते.ही एकच गोष्ट सोडली तर प्रत्येक बाबतीत त्यांचे एकमत होत असे.आवडी निवडी पण सारख्या होत्या.त्या मुळे एकमेकांची जणू सवयच लागली होती.पण ती मध्येच अस्वस्थ व्हायची.आणि नात्याचे नाव शोधू लागायची.

एक दिवस रस्त्यात फुले विकणाऱ्या मुला कडून त्याने लाल गुलाब घेतला आणि तिला दिला.त्या दिवशी ती छान दिसते हे ऑफीसमध्ये खूप लोकांनी सांगितले होते. ती पुरती गोंघळून गेली.तिला वाटले त्याच्या या कृतीचा अर्थ काय असावा?त्या नंतर ती त्याला टाळू लागली.जेवढ्यास तेवढे बोलू लागली.

एक दिवस तो धावत पळत तिच्या घरी आला.

एका हातात एक बॉक्स तर दुसऱ्या हातात पोस्टाचे पाकीट.तिला म्हणाला बहिणीने राखी पाठवली आहे. तूच बांध आणि हा माझ्या कडून ड्रेस.ती परत गोंधळात पडली.

एक दिवस सिनेमाची तिकिटे काढली.दोघे त्याच्या हट्टामुळे सिनेमाला गेले.त्यात हिरोची आई मरते असे दृश्य होते.तो इतका भावना विवश झाला.घरी येऊन तिच्या मांडीवर डोके ठेवून मनसोक्त रडला.ती डोक्यावर हात फिरवत राहिली.

नोकरी बदलताना, ड्रेस घेताना कोणतेही छोटे मोठे निर्णय तिला विचारून घेत होता.

प्रत्येक गोष्ट तिला सांगत होता.ही सगळे आनंदाने ऐकत होती,सल्ले देत होती.पण मध्येच हीचा प्रश्न डोके वर काढायचा. आपले नाते काय?

 तिच्या मनातील घालमेल त्याला समजली.एक दिवस त्याने तिला आपल्या बरोबर नेले.रस्त्याने ऊन लागत होते.तिने स्कार्फ बांधून घेतला.रस्त्यात वाळवणे दिसली.ऊन आवश्यक असणारी आणि ऊन त्यांना किडी पासून वाचवणार होते.पुढे उन्हाळ्यात चालणारी रस्त्याची,काही सफाईची कामे दिसली.त्यांना एक बांधकाम दिसले.ते काम पावसाळ्या पूर्वी पूर्ण व्हायला हवे म्हणून मालक कडक सूचना देत होता.तिथल्याच झाडा खाली काही प्राणी उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून झाडा खाली बसले होते.दुसऱ्या झाडाखाली एका मजुराचे बाळ झोळीत झोपले होते.आणि त्याची आई त्याला ऊन लागू नये म्हणून जपत होती.

एकीकडे फुले सुंदर फुलली होती तर एकीकडे नाजूक गवत करपत होते.

हे सगळे त्याने तिला दाखवून दिले आणि विचारले आता सांग ऊन कसे आहे?ती पुन्हा विचारात पडली.आणि उत्तर शोधू लागली.मग तोच पुढे म्हणाला,ज्यावेळी मी तुला लाल गुलाब दिला त्या वेळी तुझ्यात मला प्रेयसी दिसली होती.ज्या वेळी मी राखी बांधून घेतली त्यावेळी तुझ्यात बहीण दिसली होती.ज्या वेळी मी हळवा होऊन रडलो त्यावेळी तुझ्यात आई दिसली होती.प्रत्येक सल्ला घेताना तुझ्यात उत्तम सल्लागार दिसला होता.प्रत्येक गोष्ट शेअर करताना एक जिवलग मैत्रीण दिसत होती.

जशी उन्हाची विविध रूपे दिसली,ऊन चांगले की वाईट हे त्याच्या त्या त्या वेळे नुसार ठरते.तसेच आपले नाते आहे.आता त्याला कोणते नाव द्यायचे हे तूच ठरव.आणि जास्त गोंधळात पडू नको.आणि आपण आपल्या या सगळ्यात समाधानी आहोत,तर प्रत्येक नात्याला नाव देण्याचा अट्टाहास करू नको.कदाचित नात्याला नाव देण्या मुळे आपण दुरावले जाऊ.

या सगळे तिला मनापासून पटले आणि नवीन मैत्रीच्या विविध धाग्यांनी विणलेला गोफ सोबत घेऊन ती समाधानाने शांत चित्ताने घरी गेली.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “वाढती लोकसंख्या आणि मराठी साहित्य…भाग-2” ☆ श्री वि. दा.वासमकर ☆

डॉ. वि. दा. वासमकर

☆ “वाढती लोकसंख्या आणि मराठी साहित्य…भाग-2” ☆ श्री वि. दा.वासमकर 

(सारांश सतराव्या शतकामध्ये रामदास स्वामींनी घरामध्ये पोरवडा वाढविण्याचे दुष्परिणाम अत्यंत परखडपणे वर्णन केले आहेत.)

आता ग. दि. माडगूळकरांची ‘आकाशाची फळे’ या कादंबरीचा विचार करूया. ग. दि. माडगूळकर हे मराठी साहित्यविश्वाला गीतकार, पटकथाकार, आणि ‘गीतरामायण’ या अजरामर काव्यग्रंथाचे निर्माते म्हणून परिचित आहेत. किंबहुना ‘गीतरामायणा’च्या निर्मितीने त्यांना आधुनिक वाल्मिकी म्हणून समाजात आदराचे स्थान प्राप्त झाले आहे. त्यांची ‘आकाशाची फळे’ ही कादंबरी त्यांच्या पद्य साहित्याइतकीच महत्त्वाची आहे या कादंबरीचा आशय लोकसंख्या वाढीचा दुष्परिणाम वर्णन करणारा आहे. ही कादंबरी 1960 मध्ये प्रकाशित झाली. आणि 1961 मध्ये या कादंबरीचे महत्त्व जाणून प्रपंच हा सिनेमा मराठी मध्ये निघाला आणि तो महाराष्ट्र सरकारने गावोगावी मोफत दाखविला.

आता या कादंबरीचा आशय थोडक्यात पाहू. विठोबा कुंभार व पारू यांच्या कौटुंबिक जीवनाची ही कथा आहे. त्यांचा दरिद्री फटका संसार आणि सहा मुले यामुळे विठोबा कर्जबाजारी झाला आहे. आणि त्यातूनच तो आत्महत्या करतो. शहरात बरीच वर्षे राहिलेला आणि कुंभारव्यवसायाचे आधुनिक शिक्षण घेतलेला विठोबाचा भाऊ शंकर याच्यावर त्याच्या भावाच्या म्हणजे विठोबाच्या कुटुंबाची जबाबदारी येते. भावाच्या कुटुंबाला सुखी करण्यासाठी आपण लग्न करणार नाही, अशी प्रतिज्ञा तो करतो. त्यासाठी प्रचंड कष्ट उपसतो. आणि आजारी पडतो. आपल्या दिराने आपल्या सुखाचा त्याग करून आपल्या कुटुंबासाठी झिजणे हे सहन न होऊन आपल्या आजारी दिराला म्हणजे शंकरला चंपाच्या हवाली करून पारू मुलांसह दूर निघून जाते. शेवटी शंकर आणि चंपाच्या लग्नासाठी ती परत येते. इत्यादी घटना प्रसंग या कादंबरीत येतात. या कादंबरीत इतरही उपकथानके येतात आहेत. चंपा आणि तिचे वडील रामू तेली यांचे कुटुंब रामू तेल्याच्या पिठाच्या गिरणीचा आणि तेलाच्या घाण्याचा व्यवसाय आहे. तेलाच्या व्यवसायामुळे त्याचे कुंभार हे आडनाव मागे पडून तो रामू तेली म्हणूनच ओळखला जातो. आपल्या मुलीला म्हणजे चंपाला त्याने मुलासारखेच वाढवलेले असते. चंपाला शंकरबरोबर लग्न करण्याची इच्छा आहे. मात्र शंकर आपल्या भावाच्या कुटुंबासाठी लग्न करायला तयार नसतो. त्यामुळे चंपा आणि रामू तेली दोघेही कष्टी होतात. गावात जगू शिंपी आणि त्याची बायको राधा यांचे कुटुंब आहे. या दांपत्याला अपत्यहीनतेचे दुःख जाळीत असते. त्यांच्या जीवनात बाकेबिहारी या ढोंगी साधूचा प्रवेश होऊन राधा या ढोंगी साधूबरोबर पळून जाते. जगु शिंप्याला एकट्यानेच भयानक आयुष्य जगावे लागते. शंकरचा बालमित्र रघू आणि त्याची बायको सरू यांचा दारिद्री संसार हे आणखी एक छोटे उपकथानक या कादंबरीत येते. वडगावच्या बाजारातील जोशी काका, गफूर भाई हे विठोबाच्या व्यवसायातील सहकारी. यातील जोशी काकांचे मोठे कर्ज विठोबाने घेतले असून ते त्याला फेडणे अशक्य झाल्यामुळे त्याने आत्महत्या करण्याचा मार्ग पत्करला. या सर्वांच्या जोडीला शंकर आणि चंपा यांची अव्यक्त स्वरूपातील प्रेमकहाणी या कादंबरीत महत्त्वाची जागा व्यापते. मात्र कादंबरीचे शीर्षक ‘आकाशाची फळे’ हेच या कादंबरीचे सर्वात महत्त्वाचे आशयसूत्र आहे. विठोबा आणि पारूची जोडी प्रातिनिधिक स्वरूपाची आहे. त्या काळात 1960 च्या दरम्यान शिक्षणाचा प्रसार तितका झालेला नसल्यामुळे कुटुंब नियोजनाच्या बाबतीत भारतीय समाज अजून बराच मागासलेला होता. कुटुंबात वाढणारी मुलांची संख्या दारिद्र्याला कारणीभूत होते, हेच सामान्य माणसाला कळत नव्हते. उलट मुले म्हणजे देवाची देणगी, या देणगीला नकार देणे म्हणजे दैवाच्या विरोधी जाणे असा समज सार्वत्रिक होता. शिवाय देवाने जन्म दिलाय म्हणजे त्याच्या अन्नाची योजनासुद्धा देवाने केलेली असतेच. इत्यादी गैरसमज रूढ असल्यामुळे गरीब दरिद्री कुटुंबाला अपत्यांची वाढ हानिकारक असते हे समाजमनाला कळत नव्हते. याचेच प्रातिनिधिक चित्रण ग. दि. माडगूळकर यांनी या कादंबरीत विठोबा कुंभार आणि त्यांच्या कुटुंबाच्या द्वारे केले आहे.

आता या कादंबरीतील काही विधाने पाहू. घरात पोरांचं लेंडर झाल्यामुळे सगळ्यांना एखादी गोष्ट वाटायची म्हटले तर ते अवघड होते. विठोबाची पोर सहा. त्यांना एखादी खायची गोष्ट मिळाली तर ती त्याच्यावर कशी तुटून पडतात, याचे वर्णन माडगूळकरांनी अत्यंत प्रत्ययकारी रीतीने केले आहे. ते असे – ‘गोविंदाने नारळ पाट्यावर आपटला… त्याची दोन छोटी भकले इकडे तिकडे उडाली. ती उचलण्यासाठी गोप्या आणि सद्या यांची झोंबाझोंबी झाली. दोघांच्याही हाती एकेक तुकडा आला. ते तुकडे दातांनी खरवडत आणिकासाठी ती गोविंदाच्या पाठीमागे येऊन उभी राहिली. दरम्यान गोविंदाने एक मोठा खोबळा करवंटीपासून वेगळा केला. तो दातात धरला आणि दुसरे भकल तो कंगोरा गवसून पाट्यावर आपटत राहिला. म्हातारी नुसतीच ओठाची चाळवाचाळव करीत होती. तिच्या हाती काहीच आले नव्हते. गोविंदाने उरलेले खोबरे करवंटीपासून मोकळे केले न केले तोवर उरलेली दोघे त्याच्यावर तुटून पडली. बघता बघता नारळातील खोबरे वाटले गेले. आणि नरट्या इतस्ततः झाल्या. लटलट मान हलवीत म्हातारी म्हणाली, ‘मला रे गोविंदा-‘ माडगूळकरांच्या या निवेदनातून घरात पोरवडा असला‌ की, कशी दुरवस्था होते, याचा प्रत्यय येतो.

देवळातील हरदासाने कृष्णाष्टमीचा प्रसाद म्हणून पारूच्या ओटीत नारळ घातला. बाळकृष्णाच्या पाळण्यातील नारळ पारूच्या ओटीत आला म्हटल्यावर विठोबाच्या आजीला आनंद होतो. ती म्हणते औंदाच्या सालीबी एक परतवंडं होणार मला. आणि विठोबाचा थंडपणा पाहून ती पुढे म्हणते- असं कसं बाबा देवाची देणगी असती ती. बामनवाड्यातली शिंपीन बघ नागव्याने पिंपळाला फेऱ्या घालते. तिचा कुसवा उजवला का? कुत्री मांजर पाळती ती अन् लेकुरवाळेपनाची हौस भागून घेती ! तुज्यावर दया हाय भगवानाची .

विठोबाच्या आजीच्या तोंडात आणखीही काही विधाने माडगूळकरांनी घातली आहेत. ती अशी- १) ज्यानं चोंच दिली, त्यो चारा देईल ; २) असं म्हणू नये इटूबा. देवाघरचा पानमळा असतोय ह्यो. ३) जे जे प्वार जन्माला येतं ते आपला शेर संगती आनतं. आंब्याच्या झाडाला मोहर किती लागला हे कुणी मापतं का?; पाऊस दर साल येतो पर कुणब्याला त्याचं कौतुक असतंच का नाही !;

विठोबाच्या आजीच्या या विधानांतून मुले ही देवाची देणगी असते. त्याला नाही म्हणता येत नाही; अशी समजूत  व्यक्त होते.

ग दि माडगूळकर यांनी या कादंबरीच्या शेवट करताना या कादंबरीतील एक पात्र नारायण गिरी याच्या तोंडी एक अभंग लिहिला आहे. तो असा-

हाती नाही बळ दारी नाही आड/त्याने फुल झाड  लावू नये/

सोसता सोसेना संसाराचा ताप /

त्याने मायबाप होऊ नये /

गव्हार तो वागे जाणिवेवेगळा/ / आकाशाच्या फळा  नर्की  टाकी / चाऱ्याविण चोच, नको नारायणा )

वेडा वा शहाणा, म्हण काही….

सारांश समर्थ रामदास आणि ग. दि. माडगूळकर यांनी आपल्या साहित्यकृतीतून लोकसंख्यावाढीचे दुष्परिणाम स्पष्ट शब्दांत वर्णिले आहेत. साहित्य या कलेत समाजमनावर परिणाम करण्याची प्रभावी शक्ती असते. या शक्तीने आपल्या देशातील जनता  सुबुद्ध होऊन हा लोकसंख्यावाढीचा भस्मासुर जाळून टाकतील अशी आशा करूया !

 – समाप्त –

© श्री वि. दा.वासमकर 

विश्रामबाग सांगली 416 415, मोबा. 98 222 66 235.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “वाढती लोकसंख्या आणि मराठी साहित्य…भाग-1” ☆ श्री वि. दा.वासमकर ☆

डॉ. वि. दा. वासमकर

अल्प परिचय 

शिक्षण : एम. ए. पीएच. डी.

अध्यापन : विलिंग्डन महाविद्यालय, सांगली येथून मराठीचे प्राध्यापक म्हणून निवृत्त.

अभ्यासक्षेत्र : साहित्य व समीक्षा

ग्रंथ : (१) संदर्भ : आयुष्याचे (कविता) अनघा प्रकाशन , ठाणे १९८६. (२) दत्तांकुराची कविता (संपादन) मंजुळ प्रकाशन, पुणे २०१३. (३) मराठीतील कलावादी समीक्षा (समीक्षा) अक्षरदीप प्रकाशन, कोल्हापूर २०१९, (४) उद्ध्वस्त नभाचे गाणे (कविता) अक्षरदीप प्रकाशन कोल्हापूर २०१९.

‘मराठीतील कलावादी समीक्षा ‘ या ग्रंथाला १) म. सा. प. पुणे,२) द. म. सा. कोल्हापूर, ३) आपटे वाचन मंदिर इचलकरंजी यांचे पुरस्कार.

विविध नियतकालिकांतून समीक्षात्मक लेखन.

☆ “वाढती लोकसंख्या आणि मराठी साहित्य…भाग-1” ☆ श्री वि. दा.वासमकर 

वाढती लोकसंख्या ही आज जगासमोरील सर्वात गंभीर समस्या आहे. मात्र जगातील लोकसंख्यावाढीची समस्या सर्वच राष्ट्रांना भेडसावत नाही. कारण  संयुक्त संस्थाने, रशिया, इंग्लंड, कॅनडा अशा प्रगत राष्ट्रांमध्ये लोकसंख्या खूपच कमी आहे. तर आफ्रिका खंडातील देश, तसेच भारत आणि चीनसह सर्व दक्षिण आशियाई  राष्ट्रांची लोकसंख्या भरमसाठ आहे. प्रगत राष्ट्रांची लोकसंख्या कमी तर आहेच; शिवाय या देशांना निसर्गाने प्रचंड साधन संपत्ती उपलब्ध करून दिली आहे.  त्यामुळे या देशांमध्ये लोकसंख्यावाढीची समस्या तितकी गंभीर नाही. मात्र अविकसित देशांच्या वाट्याला साधनसंपत्ती फारच कमी आली आहे. त्यामुळे या देशांना लोकसंख्यावाढीमुळे निर्माण होत असलेल्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. भारत लोकसंख्येच्या बाबतीत आतापर्यंत जगात दोन नंबरला होता. मात्र अलीकडेच चीनला मागे टाकून आता भारत पहिल्या नंबरला आला आहे. पहिला क्रमांक मिळणे हे इतर क्षेत्रात भूषणावह असते. मात्र लोकसंख्येच्या क्षेत्रात ते लाजिरवाणे आहे, असे म्हणावे लागते.  लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न विसाव्या शतकापासून गांभीर्याने सुरू झाला असे दिसते.

भारतातील लोकसंख्यावाढीची कारणे पाहिली असता असे दिसते की, भारतीय समाजामध्ये असलेले अज्ञान, अंधश्रद्धा, रुढी आणि परंपरा यांच्याबरोबरच असाक्षरता ही कारणे महत्त्वाची आहेत. आजही भारतातील बहुतेक लोक निरक्षर आहेत. त्यामुळे अज्ञानापोटी ‘मुलांचा जन्म म्हणजे ईश्वरी देणगी’ असते, अशी समजूत ग्रामीण भागात बहुतांश रूढ आहे. अज्ञान व अंधश्रद्धेमुळे अजूनही ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी अनेक मुले जन्माला घातली जातात. कायद्याचा वचक असतानासुद्धा बालविवाह लावले जातात. पुत्रप्राप्तीच्या हव्यासापोटी मुलाच्या जन्मास महत्त्व दिले जाते. त्यामुळे अनेक मुलींच्या नंतरही मुलासाठी प्रयत्न केला जातो. बेसुमार लोकसंख्या वाढीमुळे अनेक समस्या निर्माण होतात. लोकसंख्यावाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंची टंचाई होते. झोपडपट्ट्यांचा प्रश्न निर्माण होतो. बेकारीची समस्या उद्भवते. त्यामुळे पर्यायाने गुन्हेगारीप्रवृत्तीही वाढू लागते. लोकसंख्यावाढीचा परिणाम आरोग्यावरही होत असतो. लोकसंख्या वाढीचे सकारात्मक परिणामही होत असतात. पण ते कमी प्रमाणात असतात.

लोकसंख्यावाढीचे स्वरूप लक्षात घेऊन त्यावर काहीतरी उपाययोजना करणे आवश्यक आहे; अशा स्वरूपाच्या विचारांना भारतात स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या उत्तरार्धापासून कुटुंब नियोजन कार्यक्रम हाती घेतला आहे परंतु अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा इत्यादी गोष्टींनी ग्रासलेल्या  समाजात कुटुंब नियोजन ही कल्पना सुरुवातीस रुजविणे अत्यंत कठीण गेले असे दिसते गेली 50-60 वर्षे भारतातील शासकीय यंत्रणा व समाजातील स्वयंसेवी संस्था कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यात थोडेफार यशही आले आहे. मात्र अजूनही या प्रयत्नांना वेग येणे आवश्यक आहे. या कार्यक्रमास, या प्रयत्नास समाजाने योग्य ते सहकार्य दिल्यास लोकसंख्या वाढीवर निर्बंध घालता येणे सहज शक्य आहे. लोकसंख्यावाढीच्या समस्येवर निर्बंध घालण्यासाठी शिक्षण क्षेत्र, विविध कला, साहित्य यांच्या माध्यमातून प्रबोधन होणे आवश्यक आहे. लोकसंख्या समस्येवर निर्बंध घालण्यासाठी शिक्षण क्षेत्राचा उपयोग केला जातो. कारण शिक्षण हे समाज परिवर्तनाचे एक प्रभावी साधन आहे. शिक्षणामुळे समाजातील वाईट रूढी, अज्ञान व अंधश्रद्धा काढून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. शिक्षणामुळे समाजातील लोकांना जशा चांगल्या सवयी लावता येतात; त्याप्रमाणेच समाजातील वाईट सवयी काढूनही टाकता येतात. त्यामुळे ही नवीन जबाबदारी शिक्षणक्षेत्रावर येऊन पडते. शिक्षणाबरोबरच साहित्यादी कला यांच्याद्वारेही समाजावर संस्कार करता येतो. कविता, नाटक, शाहिरीकाव्य तसेच कथा-कादंबऱ्या याद्वारेही समाजमनाला आवाहन करता येते. साहित्याच्या वाचनाने वाचकावर संस्कार होत असतो. मराठी साहित्याच्या इतिहासात आजपर्यंत अनेक साहित्यकृतींनी यामध्ये आपला आपले योगदान दिले आहे त्याचा येथे थोडक्यात विचार करू.

साहित्यात वास्तव जीवनाचे प्रतिबिंब पडत असते. कधी ते प्रत्यक्ष रीतीने पडते. तर कधी  अप्रत्यक्षरीत्या.  येथे लोकसंख्यावाढीचे चित्रण साहित्यात अप्रत्यक्षरीत्या कसे होते हे आधी पाहू. आणि त्यानंतर लोकसंख्यावाढीचा प्रत्यक्ष परिणाम कोणत्या मराठी साहित्यकृतीत चित्रित झाला आहे ते पाहू. हरिभाऊ आपटे यांची ‘पण लक्षात कोण घेतो’ ही मराठीतील एक महत्त्वाची कादंबरी. ही कादंबरी 1891 ते 1893 या कालावधीत ‘करमणूक’ या साप्ताहिकात क्रमशः प्रसिद्ध होत होती. या कादंबरीत उच्चवर्णीय ब्राह्मण समाजाचे चित्रण आले आहे. या काळातील ब्राह्मण समाज अनेक वाईट रूढींनी ग्रासलेला होता. स्त्रियांना शिकण्याचा अधिकार नव्हता. बालाजरठ विवाहाच्या पद्धतीमुळे स्त्रिया लहानपणीच विधवा होत. लहान वयात लग्न केल्यामुळे स्त्रियांना अनेक बाळंतपणे सोसावी लागत. त्यामुळे अनेक मुलांना आणि मातांना अकाली मृत्यू येत असे. यांचे प्रभावी चित्रण या कादंबरीत आले आहे. हे सर्व लोकसंख्यावाढीचे अप्रत्यक्ष परिणाम म्हणून सांगता येतील. लोकसंख्या वाढीमुळे बेकारीची समस्या ही तीव्र स्वरूप धारण करत असते, याचे चित्रण ह.मो. मराठे यांच्या ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ या लघु कादंबरीमध्ये प्रत्ययकारी रीतीने आलेले आहे. ज्योती म्हापसेकर यांच्या ‘मुलगी झाली हो’ या नाटकात  अप्रत्यक्षपणे याच समस्येचे प्रतिबिंब पडले आहे, असे म्हणता येईल. बाबुराव बागुल यांचा ‘मरण स्वस्त होत आहे’ हा कथासंग्रह जर बारकाईने वाचला, तर त्यातील अनेक कथांमध्ये प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने लोकसंख्यावाढीचे दुष्परिणाम चित्रित झाले आहेत, असे दिसेल. या संग्रहातील ‘लुटालूट’ आणि ‘मैदानातील माणसे’ यांसारख्या कथांतून दारिद्र्याचे अंगावर शहारे आणणारे वर्णन बागुल यांनी केले आहे. ‘लुटालूट’ या कथेत वेश्या वस्तीतील स्त्रियांचे अत्यंत खालच्या पातळीवरचे जगणे आले आहे. आणि ‘मैदानातील माणसे’ मधील मैदानात थंडीच्या  रात्री असंख्य माणसांचा थंडीपासून संरक्षण करण्यासाठी चालेला संघर्ष  हे  लोकसंख्या वाढीच्या दुष्परिणामाचे चित्रण म्हणावे लागते. अशा रीतीने लोकसंख्यावाढीचा अप्रत्यक्ष परिणामाचे चित्रण यांसारख्या साहित्यकृतीतून केले जाते, असे म्हणता येईल. आता लोकसंख्या वाढीचे प्रत्यक्ष परिणाम चित्रित करणाऱ्या काही साहित्यकृतींचा विचार करू.

लोकसंख्या वाढीचा परिणाम दर्शवणारी प्राचीन साहित्यकृती म्हणजे समर्थ रामदास स्वामींची ‘लेकुरे उदंड झाली’ या रचनेचा उल्लेख करता येईल. रामदास स्वामींच्या ‘दासबोध’ या ग्रंथामध्ये तिसऱ्या दशकातील चौथ्या आणि पाचव्या समासामध्ये  लोकसंख्या वाढीच्या परिणामाचा आशय आला आहे. समर्थ म्हणतात-

लेकुरे उदंड जाली /तो ते लक्ष्मी निघून गेली /

बापडी भिकेस लागली / खावया अन्न मिळेना

या संपूर्ण रचनेचे सार थोडक्यात असे सांगता येईल – घरामध्ये मुले पुष्कळ झाली तर त्या घराची लक्ष्मी निघून जाते. ही मुले मग भिकेस लागतात. त्यांना खायला अन्न मिळत नाही. या मुलांपैकी एक खेळत असते; एक रांगत असते; तर एक पोटामध्ये असते. अशा तऱ्हेने घरभर मुलांची आणि मुलींची दाटी होते. त्यामुळे दिवसेंदिवस खर्च वाढतो. येणारे उत्पन्न बंद होते. मुली उपवर झाल्यावर त्यांना उजवण्यासाठी द्रव्य राहत नाही. आई-बाप श्रीमंत असले, तरी ह्या उदंड लेकरांमुळे त्यांना दारिद्र्य येत राहते.समाजातील प्रतिष्ठा आणि मान निघून जातो. खाणारी तोंडे वाढल्यामुळे बापाला चिंता लागून राहते. त्याचा उद्वेग वाढतो. मुली उपवर झाल्या की त्यांचे आणि मुले मोठी झाली की त्यांचे लग्न करावे लागते. मुले – मुली तशाच राहिल्या तर पुन्हा लोक लाज काढतात. लोकांकडून  छीथू होते. आणि घरातील कर्त्या पुरुषाचे नाव जाते. म्हणून लग्नासाठी कर्ज काढावे लागते. त्यासाठीसुद्धा समाजात पत राहत नाही. मग घरातील पाडा-रेडा विकून ऋण घेऊन मुलाबाळांची लग्न करावी लागतात. परंतु असे घेतलेले ऋण फेडायचे कसे आहे हा प्रश्न पडतो. मग सावकार वेठीस धरतो आणि मग अशा कर्त्या पुरुषाला गाव सोडून  काम धंदा मिळवण्यासाठी परदेशात जावे लागते. हे सर्व अनर्थ घरामध्ये उदंड लेकरे झाल्यानंतर होतात, असे रामदास स्वामी म्हणतात. आणि शेवटी या कर्त्या पुरुषावर रडायची पाळी येते, असे वर्णन करून शेवटी रामदास स्वामी म्हणतात, –

अरण्य रुदन करिता /कोणी नाही बुझाविता /

मग होय विचारता /आपुले मनी /

आता कासया रडावे /प्राप्त होते ते भोगावे /

ऐसे बोलुनीया जीवे /धारिष्ट केले /

सारांश सतराव्या शतकामध्ये रामदास स्वामींनी घरामध्ये पोरवडा वाढविण्याचे दुष्परिणाम अत्यंत परखडपणे वर्णन केले आहेत.

क्रमशः… 

© श्री वि. दा.वासमकर 

विश्रामबाग सांगली 416 415, मोबा. 98 222 66 235.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “लोकमान्य बाळ गंगाधर टिळक “एक उत्तुंग व्यक्तीमत्व…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

“लोकमान्य बाळ गंगाधर टिळक “एक उत्तुंग व्यक्तीमत्व”…” ☆ सौ राधिका भांडारकर 

मुंबईच्या हायकोर्टाच्या आवारात एका संगमरवरी पाटीवर हे शब्द कोरलेले आहेत.

IN SPITE OF THE VERDICT OF THE JURY IS STILL MAINTAIN THAT I AM INNOCENT. THERE ARE HIGHER POWERS THAT RULE THE DESTINY OF MEN AND NATION…

“जुरीने मला दोषी ठरवले तर खुशाल ठरवू दे पण मी गुन्हेगार नाही लौकिक गोष्टींचे नियंत्रण करणारी एक शक्ती या न्यायपिठाहून वरिष्ठ आहे.  मला शिक्षा व्हावी आणि मी शिक्षा भोगल्यानेच मी अंगीकारलेल्या कार्याला ऊर्जीतावस्था  यावी अशी कदाचित या शक्तीचीच इच्छा असेल.”

हे स्पष्ट, कणखर, खडे बोल आहेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या जहालमतवादी, उत्तुंग व्यक्तीचे.

राजेद्रोहाच्या आरोपावरून त्यांना सहा वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली गेली होती.  या काळात टिळकांना साबरमतीच्या तुरुंगात ठेवलं  गेलं आणि नंतर रंगून मार्गे त्यांना मंडालेच्या तुरुंगात रवाना केलं गेलं .(१९०८)  पण आरोप, शिक्षा, कारावास , टिळकांसारख्या महापुरुषाला यत्किंचीतही विचलित करत नसत. त्यांना त्यांच्या ध्येयापासून दूर नेत नसत. उलट या सहा वर्षाच्या अत्यंत कष्टमय, तापदायक  आणि प्रतिकूल वातावरणात मंडाले येथील तुरुंगवास भोगत असतानाच गीतारहस्य हा  अनमोल ग्रंथ त्यांनी लिहिला. 

वास्तविक रत्नागिरी येथे जन्मलेले (२३जुलै १८५६) केशव गंगाधर टिळक म्हणजेच बाळ गंगाधर टिळक यांच्यात जन्मतःच काही ठळक गुण होते.  शालेय जीवनात ते एक उज्वल विद्यार्थी होते.  त्यांच्यात एक नैसर्गिक सच्चेपणा आणि सरलता लहानपणापासूनच होती.  लहान वयातच त्यांची स्वतंत्र मते होती.  त्यांची वृत्ती सहिष्णु होती आणि अन्यायाबद्दल  त्यांना अपार चीड होती.

स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील एक युग म्हणजे लोकमान्य टिळक होय.   अनेक वर्ष इंग्रजांचे गुलाम झालेल्या जनतेच्या मनात प्रखर राष्ट्रवाद, देशप्रेम व स्वातंत्र्याची भावना निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम टिळकांनी केले.

लोकमान्य टिळक म्हणजे प्रखर पत्रकार.

थोर समाज सुधारक.

स्वातंत्र्य सेनानी.

राष्ट्रीय नेता.

संस्कृत भाषेचे पंडित आणि एक विद्वान शिक्षक.

जातीय व्यवस्थेचे योग्य समर्थन करणारे समाज सुधारक.

लोकमान्य टिळकांचे विचार हे जनतेद्वारे स्वीकृत होते म्हणूनच त्यांच्यापुढे लोकमान्य हे संबोधन लावलं गेलं.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या अग्रस्थानी ते होते. लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य खूप विस्तृत आहे. राष्ट्रीय कल्याणासाठी,, जनजागृतीसाठी आणि एक राष्ट्रीय मन घडवण्यासाठी त्यांची अविरत धडपड होती.

शैक्षणिक जाण वृद्धिंगत व्हावी म्हणून डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना त्यांनी केली आणि त्यातूनच पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली जिथे टिळक स्वतः विद्यार्थ्यांना गणित व संस्कृत या विषयांचे धडे देत. या कार्यामध्ये आगरकर, चिपळूणकर, रानडे, भांडारकर या थोर राष्ट्रीय विभूती त्यांच्यासोबत होत्या.  न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापनाही याच संस्थेच्या माध्यमातून झाली.  सर्वसामान्य विद्यार्थ्यांना स्वस्तात शिक्षण उपलब्ध व्हावे हा या मागचा प्रमुख हेतू होता.

आर्यभूषण छापखान्याची  सुरुवात करून केसरी आणि मराठा ही दैनिके सुरू करून त्या माध्यमातून परखड लेख लिहून स्वातंत्र्यासाठी टिळकांनी जनजागृती केली. तरुणांमध्ये देशप्रेम जागृत व्हावे, सर्व समाज एकत्र यावा या भावनेने त्यांनी गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव यांना सार्वजनिक स्वरूप दिले.  आजही देशभर हे उत्सव जोशाने साजरे केले जातात. मात्र यामागच्या  टिळकांच्या पायाभूत संकल्पनेचे काय झाले हा विषय वेगळा आणि विचार करण्यासारखा आहे. होमरूल लीगची स्थापना टिळकांनी केली. ही एक राष्ट्रीय राजकीय संघटना होती.

स्वातंत्र्यलढ्यात जाणीवपूर्वक आणि आंतरिक तळमळीने उतरणारी अनेक माणसे होती. त्यांचे ध्येय आणि उद्दिष्ट एक असले तरी दिशा निराळ्या होत्या, वाटा निराळ्या होत्या, विचार प्रवाह भिन्न होते.  टिळकांची विचारधारा ही प्रखर होती. थेट होती. ” सरकारचे डोके फिरले आहे का” असे निर्भीड वक्तव्य ते करत.  त्यामुळे एकत्र काम करणाऱ्या धुरीणांमध्ये फूट पडली.  दोन वैचारिक गट त्यातून निर्माण झाले.  जहाल मतवादी आणि मवाळ मतवादी.  टिळकांनी जहाल गटाचे नेतृत्व स्वीकारले. त्यामुळे टिळकांची आणि इतर जहाल मतवादी विचारसरणीच्या लोकांची काँग्रेस मधून हकालपट्टी झाली. या सगळ्या घटना १९०७/१९०८ या दरम्यान घडल्या.

स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य असा चतुसूत्रीचा कार्यक्रम त्यांनी राबवला.  त्यातूनच परदेशी कापडाची होळी ही ऐतिहासिक घटना घडली.  स्वदेशी वस्तूंचीच खरेदी करण्यासाठी टिळकांनी जनजागृती केली.

टिळकांचा खरा भरवसा होता तो देशातील युवाशक्तीवर. त्यांना संघटित करण्यासाठी टिळकांनी अनेक राष्ट्रीय कार्यक्रम राबवले.  त्यांची  “जाज्वल्य राष्ट्रप्रेम, राष्ट्रासाठी काहीही, देश पहिला” ही मानसिकता त्यांनी त्यांच्या दमदार लेखनातून आणि भाषणातून तयार केली.  ते तरुणांना सांगत, “धर्माची सत्यप्रियता, भीमाचे बाहुबळ आणि अर्जुनाची तत्परता आणि शौर्य अंगी बाळगण्याचा प्रयत्न करा”

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे टिळकांनी ब्रिटिशांना ठणकावून सांगितले. आणि टिळकांच्या या घोषणेमुळे स्वातंत्र्यलढ्याचे आंदोलन अधिक तीव्र झाले.

टिळक आणि आगरकर यांच्यातील मैत्री ही इतिहासात प्रसिद्ध.  मात्र वैचारिक मतभेदांमुळे या मैत्रीत फाटाफूट झाली.  आगरकरांचे म्हणणे होते स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणेला प्राधान्य द्यावे तर टिळकांच्या मते राजकीय स्वातंत्र्य हे अग्रक्रमावर होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समाज सुधारणेला गती मिळेल असे टिळकांचे ठाम, परखड मत. बालविवाहाच्या प्रश्नांवरून आणि संयत वयाच्या धोरणावरून ही मतभेदांची दरी रुंदावत गेली. वास्तविक दोघेही आपापल्या तत्वाशी तडजोड न करणारे. ध्येय एक असले तरी मार्ग भिन्न झाले पण या मतभेदातही परस्पर मैत्रीच इतिहासाने पाहिली.  मतभेद झाले पण मने तुटली नाहीत .

कोण बरोबर कोण चूक हे अजूनही काळाला ठरवता मात्र आलेले नाही.

भारतीय असंतोषाचे जनक म्हणजे लोकमान्य टिळक. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ते स्फूर्तीदाते होते.  सावरकरांच्या क्रांतिकारक जीवनाच्या स्फूर्तीचे गुरु पद त्यांनी टिळकांनाच बहाल केलं होतं.  सावरकरांच्यातलं स्फुल्लिंग टिळकांनीही  टिपलं होतं.

टिळकांच्या नेतृत्वाचा दबदबा त्यावेळी वाढलेला होता आणि त्यातूनच सावरकरांसारखी तरुण क्रांतिकारी माणसं स्वातंत्र्यलढ्याच्या भविष्यासाठी तयार होत होती.  टिळकांच्या उत्तुंग आणि दिव्य व्यक्तिमत्त्वामुळे ब्रिटिशही हादरले होते.”वंदे मातरम्”ची गर्जना ब्रिटीशांची झोप उडवून देत होती.

लखनऊ करारानंतर चिरोलवर खटला भरण्यासाठी टिळक विलायतेला गेले होते निकाल विरुद्ध लागला आणि टिळक भारतात परतले.  त्यावेळी टिळक लोकमान्यतेच्या शिखरावर होते.  मात्र विलायतेच्या प्रवासाने त्यांना शारीरिक आणि मानसिक शीण आला होता. त्याही वेळी त्यांच्यातली जहाल वृत्ती टिकूनच होती.  सरकारला सहकार्य करण्याच्या मुद्द्यावर टिळकांनी प्रतियोगी सहकारिता हा शब्द चाणाक्षपणे वापरला.  यावरून टिळक आणि गांधींमध्ये वादही झाले पण तरीही हिंदू मुस्लिम एकत्र येतील, ब्राह्मणेतर चळवळीला स्वराज्याची दिशा मिळेल अशी टिळकांनी तयारी करून ठेवली.

हळूहळू प्रकृती ढासळू लागली होती.  तरीही आल्या गेल्यांशी ते हास्यविनोद करत होते.  कौटुंबिक जीवनात ते अडकले नाहीत.  शेवटपर्यंत ते फक्त देशाच्या राजकारणाबद्दलच बोलत होते.

एक ऑगस्ट १९२०चा दिवस!  मुंबईच्या सरदार गृहापुढे लोक रस्त्यावर उभे होते.  मध्यरात्र उलटली होती. लोकमान्य यांचे देहावसन झाल्याची बातमी आली आणि प्रचंड जनसमुदायांच्या तोंडून शोकाचे आणि दुःखाचे विदारक उद्गार बाहेर पडले.  लोक अक्षरशः धाय मोकलून रडले.

महानिर्वाण यात्रेत स्त्रिया, पुरुष ,म्हातारे,  हजारो गिरणी कामगार,  हिंदू,  मुसलमान,  ख्रिस्ती,  पारशी,  जैन सारेच होते.  आकाशाची शिवण उसवावी आणि आभाळ फाटावे असा पाऊस होता आणि त्या मेघगर्जनेपेक्षाही “टिळक महाराज की जय” ही लोकगर्जना अवघ्या महाराष्ट्राला हलवून सोडत होती.

आज हे सगळं लिहीत असताना, मागे वळून पाहताना मनात येतं, या थोर उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आपला देश आज कुठे चालला आहे? राष्ट्रासाठी यांचे संसार पणाला लागले.  प्रत्येक वेळी तुरुंगात जाताना पत्नीकडून हातावर ठेवलेले दही घेताना टिळक पत्नीला म्हणत “तुमच्या खांद्यावर संसार ठेवून आम्ही हा राष्ट्राचा संसार सांभाळू शकतोत”. धन्य त्या स्त्रिया! कळत नकळत स्वातंत्र्याच्या लढाईत त्यांनीही अशा रितीने विडा उचलला होता.त्यांचे संसार सर्वसामान्यांसारखे नव्हतेच,

आज मनात येतं “कहाँ गये वो लोग”? त्यांचा त्याग, त्यांचे बलिदान, त्यांचे कार्य  देशवासीयांच्या मनात सदैव उजळत राहो हीच त्यांच्या स्मृतीला  खरी श्रद्धांजली!

(लोकमान्य टिळकांवर लिहायला पाहिजे असेच ठरवले आणि ते एका कर्तव्य भावनेने, कृतज्ञतेच्या,ऋणी भावनेने. वास्तविक अशा लोकमान्य व्यक्तीवर लिहिणे किती अवघड आहे हे लिहिताना जाणवत राहिले पण तरीही…. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती)

धन्यवाद!

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “दुखणं… वैयक्तिक, कौटुंबिक, आणि राजकीय…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “दुखणं… वैयक्तिक, कौटुंबिक, आणि राजकीय…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

दुखणं या बद्दल काय सांगायचं. समज आली की दुखणं जाणवतं. किंवा दुखणं जाणवायला लागलं की समज येते.

अनेक प्रकारची दुखणी आहेत. पण सण म्हटलं की गणपती, नवरात्र, दिवाळी हेच पहिल्यांदा डोळ्यासमोर येतात, तसंच दुखणं म्हटलं की पहिल्यांदा आठवते ती डोकेदुखी किंवा पोटदुखी.

दुखण्यांची मेरिट लिस्ट केली तर डोकेदुखी आणि पोटदुखी कायम लिस्ट मध्ये वरच्या नंबरवर येतील.

हि दोन्ही दुखणी शारीरिक असतात तशीच ती मानसिक सुद्धा असतात.

नवरा बायको या नात्यात हे कधीकधी जुळ्याच दुखणं असतं. म्हणजे बायकोने काही (मनाला न पटणारं) केलं तर ती नवऱ्याची डोकेदुखी असते. तर नवऱ्याने काही (मनाविरुद्ध) केलं तर ती बायकोची पोटदुखी. कोणाही एकाला एक दुखण आल, तर दुसऱ्याला दुसर आपोआप येत.

अर्थात मनाविरुद्ध काही झाल्यावर होणारी डोकेदुखी आणि पोटदुखी नवरा बायको सोडून बाहेर, आजुबाजुला, समाजात, राजकारणात सुध्दा असते. पण नवरा बायकोची जवळची आणि आपली असते.

सहज म्हणून फिरायला गेल्यावर सुध्दा रस्त्यावरच्या दुकानात मिळणाऱ्या भांड्याच्या घासणी पासून कपाळावरच्या टिकली पर्यंत बायकोचा खरेदीचा उत्साह हि नवऱ्याची डोकेदुखी असते. तर वीकएंडला मित्रांसोबत घालवलेला वेळ बायकोची पोटदुखी.

माॅलमध्ये गेल्यावर दोनच वस्तू घ्यायच्या असल्या तरी पाहिल्या जातात दहा ते बारा. अशा दुकानातल्या वस्तू पाहिल्यावर बायको उत्साहाने विचारते सुध्दा ……. घ्यायच्या का?… त्यावर नवरा तेच शब्द पण वेगळ्या पद्धतीने बायकोलाच विचारतो….. घ्यायच्या?….. का?…. शब्द तेच असतात पण अर्थ……

बायकोच्या अशा विचारण्यात उत्साहाच्या फुग्यात आनंदाची हवा असते. तर नवऱ्याच्या विचारण्याने तिचा फुगा फुटतो….. आणि असा संवाद मग मानसिक डोकेदुखी आणि पोटदुखी यांना आमंत्रण देतो. आणि अशा आमंत्रणाची वाट बघत हि दुखणी डोक्याजवळ, आणि पोटाजवळच घुटमळत असतात.

अशावेळी बाम कामाला येत नाही. आणि हिंग लावायलाही कोणी विचारत नाही…… अशा दुखण्यानंतर वाचला, सांगितला जातो तो फक्त एकमेकांचा इतिहास….

हि दुखणी वैयक्तिक, सामुदायिक आणि राजकीय सुद्धा असतात. या तिन्ही ठिकाणी वेळ, वय यांच बंधन न पाळता मुक्त संचार करण्याचा मक्ता यांच्याकडे आहे.

नको असलेल्या माणसांची  जवळीक डोकेदुखी असते. तर आपल्या माणसांनी दुसऱ्यांशी साधलेली जवळीक पोटदुखी असते.

राजकारणात मला मिळत नाही, किंवा मिळणार नाही. या भीतीनेच या दुखण्यांचा उगम, प्रसार, आणि वाढ होते.

राजकारणात वातावरण बदललं की अशी दुखणी येतात. तर घरामध्ये अशा दुखण्यांची जाणीव झाली की वातावरण बदलायचे संकेत मिळतात.  हि दुखणी सहसा संपत नाही. ती एकाकडून दुसऱ्याकडे जातात.

अशा कौटुंबिक पण शारीरिक दुखण्यावर बाम किंवा चुर्ण काम करतं. तर मानसिक दुखण्यावर बाहेर खाणे, पिणे, फिरणे, आणि मजा करणे हेच औषध आहे.       

राजकारणात मात्र यावर फोडा आणि जोडा याच औषधाचा वापर होतो. आणि या औषधासाठी साम, दाम, दंड, भेद याचा आधार घेतला जातो.

राजकारणातील हि दुखणी काही वेळा बोलून दाखवली जातात. पण घरातल्या या दुखण्यावर न बोलण्याचा निश्चय होतो….. पण दोन्ही ठिकाणी चेहऱ्यावर दिसतातच.

हि दुखणी घरातली असतील तर, आता वयोमानाचा विचार करा आणि तसा योग्य निर्णय घ्या…. असा सल्ला मिळतो…. तेव्हा जबाबदारी घ्या….. असा सुर असतो.

पण हिचं दुखणी राजकीय असतील तर सल्ला तोच असतो. पण नेतृत्व आता तरुणांना द्या….. आणि जबाबदारी सोडा…. असा सुर असतो.

म्हणजे दुखणं सारखच पण एका ठिकाणी जबाबदारी घ्या. असा सुर. तर दुसरीकडे जबाबदारी द्या. असं सांगायचा प्रयत्न.

बऱ्याचदा घरातल्या या दुखण्यावर औषध घेतल जातं, तर इतर बाबतीत ते दिल जात.

मंगेश पाडगावकर यांची एक कविता आहे……

प्रेम म्हणजे प्रेम असत……

तुमचं आणि आमचं सेम असतं……

तसच दुखण्याच सुद्धा आहे………

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खिडकीतला पाऊस… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

🌸 विविधा 🌸

☆ खिडकीतला पाऊस… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

ब्रह्मानंद  म्हणजे नेमके काय हे समजले नसले तरी खिडकीतून , बाहेर  पडणारा पाऊस पाहण्यात जो आनंद  मिळतो त्याला ब्रह्मानंद  म्हणायला काय हरकत आहे ? ज्या आनंदामुळे आपल्या चित्तवृत्ती प्रफुल्लित  होतात आणि जो आनंद  आपल्या मनातील मळभ धुऊन काढतो तोच खरा ब्रह्मानंद  !

सौजन्याची  ऐशी तैशी ‘ म्हणत महिनाभर  मनमानी कारभा-यासारखा वागणारा हा सूर्य. त्याच्या तडाख्याने तापून निघालेल्या पृथ्वीला जगणं असह्य  होऊन गेलेलं.ग्रिष्माच्या निखा-यांनी अंग अंग पोळलेलं. एक तरी सर यावी म्हणून  आसुसलेले जीव.अशातच अनपेक्षितपणे कुठूनतरी थंडगार वा-याची झुळूक  येते.क्षणभर आश्चर्यच वाटतं.सहज बाहेर लक्ष जातं.उन्हाची तीव्रताही कमी जाणवू लागते. तसं म्हटल तर सूर्यास्ताला अजून  बराच वेळ असतो.पण बाहेर अंधार अंधार वाटू लागतो.वारे वाटेल तसे वाहू लागतात. झाडांच्या फांद्यांची घुसळण सुरू होते.पानांच्या माना मोडेपर्यंत फांद्या वाकू लागतात.कुठला कुठला पाला,पाचोळा, कागदाचे तुकडे,हा सारा केर वा-याने गोल गोल उडत उडत दारापाशी येऊन  साठतो.तेवढ्यात क्षणभर  सगळं काही शांत शांत  होतं.’ गेलेल्या ‘ पावसाला श्रद्धांजली वाहात झाडं स्तब्ध उभी राहतात.छपरावर आलेला पाऊस  गेला की काय  अशी शंका येते.तोच टप् टप् असे चार थेंब  पत्र्यावर  पडतात.घरांची  उघडी दारे धाड धाड आपटू लागतात.गेला गेला असं वाटणारा पाऊस  आपल्या लवाजाम्यासह  पुन्हा बरसू लागतो.थाड थाड थाड थाड पाय आदळत घरांच्या पत्र्यावर  नाचू लागतो.टेरेसच्या पाईप मधून पाण्याची धार सुरू होते.रस्त्याच्या कडेला पाण्याची डबकी तयार होतात.त्यात पाण्याचे टपोरे थेंब पडले की तयार होतात छोटी मोठी वर्तुळं, एकात दुसरं विरघळून जाणारी. स्वत:च्या वर्तुळातून बाहेर  न पडणा-या माणसांपेक्षा एकमेकात सहजपणे मिसळून जाणारी वर्तुळं बघितली की उगाचच मनात अपराध्यासारखं वाटू लागतं.सूर्याच दर्शन  तर आता होणारच नाही.पण चुकार किरण मात्र  एखाद्या ढगाआडून डोकावत असतात.मग मात्र  डबक्यातल पाणी आरशासारखं  चमकू लागतं.लांबून पाहिल तर अभ्रकाचा खूप मोठा तुकडाच पडलाय की काय असं वाटावं.तेवढ्यात  एखादी वीज चमकून  जाते, अंग वेडवाकडं नाचवत,एखाद्या नर्तकीसारखी  नृत्य करत. दूरवर कुठेतरी खूप मोठा आवाज  होतो आणि पडली वाटत वीज कुठेतरी ‘ लगेच चर्चा सुरू होते.तशातच या चित्रमय बदलांची कसलीही दखल न घेता एक आगगाडी उन्मत्तपणे सुसाट वेगाने धावत सुटते.कुठल्याही वेळेच बंधन नसणारा हा पाऊस, वेळा सांभाळत मुकाट्याने धावणा-या या आगगाडीकडे  पाहून मनातल्या मनात हसत तर नसेल ना ? बाहेरचा पाऊस  जराही आत येऊ नये म्हणून  आगगाडीच्या सर्व  खिडक्या बंद  करुन घेतलेल्या असतात.पण असे करताना,अंग भिजू नये म्हणून  काळजी घेताना,आपण चैतन्याच्या किती थेंबांना मुकतो आहोत याची आतल्या प्रवाशांना कल्पना नसते.विजेच्या तारांवरून घरंगळत जाणारे जलबिंदू  किंवा तारेवर बसून पंख फडफडवणारे इवले इवले पक्षी  त्यांच्या नजरेस पडू शकत नाहीत.गाडीचा आवाज विरून जातो.सगळी पाखरं कुठं चिडीचूप  होतात समजत नाही.पण लबाड बोका मात्र अंग झटकत धूम ठोकतो आणि आडोश्याचा आसरा घेतो.आता त्याने ‘ म्या आऊ ‘ ? अस विचारल तर मात्र  त्याला अगदी अवश्य  आत ये म्हणायच अस मी ठरवतो.पण तो इतका गारठलेला असतो की डोळे मिटून  गप्प उभ राहण्याशिवाय  त्याला काही सुचतच नाही.खरच,त्याला चहा द्यावा काय ? आणि एकदम लक्षात येत आपण तरी कुठे घेतलाय चहा हा पाऊस  बघण्याच्या नादात ! देहभान  विसरून  टाकायला लावणारा हा पाऊस! पण चहाची एकदा का आठवण झाली की मग मात्र  चैन पडत नाही.डोळ्यासमोर  चहाचा कप दिसू लागतो.त्यातून बाहेर  पडणा-या वाफा या,तापलेल्या जमिनीवर  मगाशी पावसाचे थेंब पडल्यावर  निघणा-या वाफांच्या इतक्याच महत्वाच्या वाटू लागतात.चहा प्यायची तीव्र  इच्छा होते आणि त्याच क्षणी ‘ती’ आपल्यासमोर चहाचा कप घेऊन  उभी असते.पृथ्वीवरच्या या अमृताचा आस्वाद  घेत घेत  मी पुन्हा खिडकीतून  बाहेर  पाहू लागतो.तंबो-याच्या तारांप्रमाणे दिसणा-या त्या जलधारांतून  निघणा-या तालबद्ध  आवाजाचा टपोरेपणा  नकळत  जाणवू लागतो.हे सर्व  पाहताना डोळ्यांना मिळणारं सुख , वहीची कितीही पानं लिहून काढली तरी मी कुणाला पटवून देऊ शकत नसतो.माझ्या अंत:करणात श्रावणसरी बरसत असतात आणि मनाच्या मोराचं नाचणं केव्हा सुरू होत हे मला समजतही नाही.हा पाऊस  माझा असतो आणि मी पावसाचा.   खाली उतरणारे मेघ, कोसळणारा पाऊस,न्हाऊन  निघालेले   डोंगरमाथे , माना तुकवून  पावसापुढे नम्र     होणारे वृक्ष,  फुलांपानांतून टपकणारे थेंब, थरथरणारी तृणपाती हे सगळं पाहताना ‘मी न माझा राहिलो ‘ अशी अवस्था होऊन जाते.मग वाटू लागतं,ब्रह्मानंद ,ब्रह्मानंद  म्हणतात तो हाच तर नव्हे  ?

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अधिक मास… ☆ डाॅ.व्यंकटेश जंबगी ☆

डाॅ. व्यंकटेश जंबगी

?  विविधा ?

☆ अधिक मास… ☆ डाॅ.व्यंकटेश जंबगी ☆

भारतीय संस्कृतीत अधिक महिन्याचे फार महत्त्व आहे.

हा कसा झाला?

भारतीय संस्कृतीत सौरमास आणि चांद्रमास असे दोन प्रकार आहेत.चांद्रमासात ३६० दिवस येतात आणि सौरमासात ३७१ दिवस येतात.दोन्हीमध्ये दरवर्षी ११ दिवसांचा फरक पडतो.हा भरून निघण्यासाठी दर तीन वर्षांनी एक अधिक महिना येतो.याला धोंडामहिना असेही म्हणतात.

याला पुरूषोत्तम मास का म्हणतात?

प्रत्येक महिन्याचा एक स्वामी ठरलेला आहे.अधिक महिन्याचे स्वामी कोण ? असा प्रश्न उपस्थित झाला.त्यावेळी श्रीविष्णु यांनी यांचे दायित्व घेतले.म्हणून याला पुरूषोत्तम मास असे म्हणतात.

३३ चे महत्व काय?

आपण एकूण ३३ कोटी देव मानतो पण ते कोटी नसून कोट आहे.कोट म्हणजे प्रकार.ही गणितातील कोटी संख्या नाही.

१२ आदित्य,११रुद्र, ८ दिक्पाल /वसु,१ प्रजापती,१वषट्कार असे हे देवतांचे प्रकार आहेत.

याप्रमाणे ३३ प्रकारचे देव आहेत.

आपला गैरसमज आहे की ३३ करोड देव आहेत,पण कोट म्हणजे प्रकार.

अधिकस्य अधिकम् फलम्

या सूत्राप्रमाणे या महिन्यात केलेले जप,तप,दान, पुराण श्रवण इ. गोष्टी अधिक फल देतात.सत्पात्री दान हे Double benefit scheme सारखे असते.दान घेणारा हा विष्णूचे स्वरूप आहे असे मानले जाते अधिक महिन्यात कोणती व्रते करावीत?

आपली परिस्थिती, शारीरिक क्षमता, मदतनीस इ.गोष्टींचा विचार करून व्रतवैकल्ये, उपवास इ गोष्टी कराव्यात.

१) ३३ दम्पतीना भोजन, दक्षिणा,वस्त्र इ.देणे

२) ३३सुवासिनीना ओटी भरणे

३) ३३ गरजू अशा विद्यार्थ्यांना गणवेष,शालोपयोगी वस्तू, रेनकोट इ.देणे.

४) गरीब बाळंतिणीला ३३ डिंकाचे लाडू देणे.

५) श्री सत्यनारायण पूजा.

६) दररोज गाईला गोग्रास देणे.

७) रोज ३३ फुलवाती लावणे.

८) वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ३३ पुस्तके वाचनालय अथवा शाळेत देणे.

९) संपूर्ण अधिक महिना एकच वेळ जेवणे.

१०) रोज ३३ अभंग/भक्तिगीते म्हणणे.

११) रोज इष्ट देवतेचा ३३ वेळा जप करावा.

१२) रोज ३३ फुले/बेलाची पाने

श्री महादेवांना वहावीत.

१३) रोज ३३ ठिपक्यांची रांगोळी काढावी.

१४) रोज श्रीमद्भागवत् महापुराण/श्रीभगवत् गीता/मनाचे श्लोक/ज्ञानेश्वरी/दासबोध इ.कोणत्याही ग्रंथाचे पठण/श्रवण/मनन/चर्चा करावी.

सध्या YouTube वर माझे एक महिना श्री मद्भागवत् महापुराण निरूपण दररोज VDO द्वारे सुरू आहे.आपण पाहू शकता.

© डॉ. व्यंकटेश जंबगी

एफ-३, कौशल अपार्टमेंट, श्रीरामनगर, ५ वी गल्ली, सांगली – ४१६ ४१४
मो ९९७५६००८८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पाऊस आणि आठवणी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

☆ पाऊस आणि आठवणी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

पाऊस आणि आठवणींचे काय नाते आहे देव जाणे! पण पाऊस आला की आठवणी येतात आणि आठवणींचा पाऊस मनात कोसळू लागतो! पावसासारख्याच आठवणींच्याही त-हा अनेक आहेत. कधी आठवणी इतक्या येऊन कोसळतात की त्यांची तुलना फक्त कोसळणाऱ्या पावसाशीच होते. कधी कधी त्या त्रासदायक असतात तर कधी आठवणी रिपरिप पडणाऱ्या पावसासारख्या असतात!आठवणी हळूहळू पण सतत येत राहतात, आणि मनाला बेचैन करतात! रिप रिप पडणारा पाऊस जसा सावकाश पण सतत राहतो, तशा या आठवणी सतत येतात आणि मनाच्या चिखलात रुतून बसतात. काही वेळा या आठवणी पावसासारख्याच लहरी असतात! कधी मुसळधार तर कधी तरल, विरळ अशा! कधीतरी अशा आठवणी वळवाच्या पावसासारख्या मृदगंध देणाऱ्या असतात! तापलेल्या मनाला शांत करतात. या आठवणींच्या गारा टप् टप् मोठ्या पडणाऱ्या असतात पण जितक्या वेगाने पडतात तितक्याच लवकर विरघळून जातात! रिमझिम पडणारा पाऊस हा प्रेमाच्या आठवणी जागवतो.त्यांची रिमझिम  माणसाला हवीशी वाटते! त्या आठवणींच्या रिमझिम पावसात माणुस चिंब भिजून जातो. पाऊस आणि आठवणींचा अन्योन्य संबंध आहे असं मला वाटतं! पाऊस येत नाही तेव्हा सारं कसं उजाड, रखरखीत होतं! तसेच आठवणी किंवा भूतकाळ नसेल तर जीवन बेचव होईल. आठवणी या मनाला ओलावा देतात.पण हो, कधी कधी पावसासारख्याच या आठवणी बेताल बनतात. पाऊस कुठेही कोसळतो, पूर येतात तशाच त्रासदायक आठवणी काही वेळा माणसाचा तोल घालवतात .त्याला त्रासदायक ठरतात. अतिरिक्त पावसासारख्या च त्याही नाश करतात.

पाऊस आणि आठवणी दोन्हीही प्रमाणात पाहिजेत, तरच त्याची मजा! कधीकधी ऊन पावसाचा खेळ होतो आणि इंद्रधनुष्य निर्माण होते! तसेच जुन्या आठवणींना उजाळा देताना आपण अगदी आनंदून  जातो.

मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या आठवणी इंद्रधनुष्यासारख्या सप्तरंगात उजळतात. आठवणींच्या थेंबावर आपल्या मनाचे सूर्यकिरण पडले की त्यावर दिसणारे इंद्रधनुष्य मनाला लोभवते आणि आनंद देते. अशावेळी आपलं मन इतके आनंदित बनते  जसे की पावसाची चाहूल लागली की मोराला आनंद होऊन तो जसा नाचू लागतो! मन मोर नाचू लागतो तेव्हा सुंदर आठवणींचा पाऊस आपल्या मनात भिजवत राहतो. सृष्टीला जशी पावसाची गरज आहे तशीच आपल्यालाही छान आठवणींची गरज असते. कधी मंद बरसत, कधी रिपरिप  तर कधी कोसळत हा आठवणींचा पाऊस आपण झेलतच राहतो…झेलतच रहातो!…….

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “माणूस…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “माणूस…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

खायला, रहायला, आणि अंगावर घालायला मिळालं की माणसाच्या गरजा संपत नाहीत. वरच्या गोष्टी मिळाल्यावर किंवा मिळवताना माणसाला माणूसच लागतो. माणसाला महत्वाची गरज असते ती माणसाचीच. आणि हा त्याला सतत हवा असतो.

वयाने, ज्ञानाने, अनुभवाने, इतकंच काय पैशाने देखील माणूस मोठा होतो. पण माणसाला मोठं करण्यात सहभाग असतो तो माणसाचाच. कोणताही माणूस एकटाच, आणि आपला आपलाच मोठा होत नाही.

बरेच कार्यक्रम हे कोणाच्या तरी नावाने होतात. अशा कार्यक्रमात साधारण तीन माणसं मोठी होतात. एक ज्याच्या नावाने कार्यक्रम आहे तो. या कार्यक्रमाला ज्याला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं आहे तो दुसरा. आणि अशा कार्यक्रमात ज्यांच कौतुक होणार आहे तो तिसरा.

यातले तिघंही आधीच मोठे असू शकतात. पण अशा कार्यक्रमामुळे त्यांचा मोठेपणा वाढतो आणि अशा प्रत्येक कार्यक्रमानंतर तो वाढत जातो. पण कार्यक्रम यशस्वी करायला गरज असते ती माणसांची.

मनातलं दुःख सांगायला माणूस नसला तरी चालतो. पण आनंद व्यक्त करायला मात्र साथ लागते ती माणसाचीच. दु:ख वाटल्याने कमी होत, आणि आनंद वाटल्याने वाढतो अस म्हणतात. पण हे कमी करणारा आणि वाढवणारा फक्त आणि फक्त माणूसच असतो‌.

करमणूक म्हणून माणूस रेडिओ, टि.व्ही. यांचा आधार घेत असेल. यावर सुरू असणारे कार्यक्रम तो ऐकतो, बघतो. पण मनातलं तो यांना सांगू शकत नाही. आणि मग आपलं ऐकायला लागतो तो माणूस.

एखादी आनंदाची गोष्ट घडल्यावर ती कधी आणि कशी सांगू अशी घाई माणसाला  होते. पण अशी गोष्ट वस्तूंना सांगून समाधान होत नाही. ते समाधान मिळवून देणारा असतो तो माणूस.

प्रवासातल्या काही वेळात सुध्दा माणूस सहप्रवाशाशी बोलत असतो. यात बऱ्याचदा प्रवास केव्हा संपतो ते कळत सुद्धा नाही.

स्पर्धेत सुध्दा कोणीतरी हरल्यामुळे जिंकणारा मोठा होतो. जिंकण्यासाठी सुध्दा हरवावं लागतं ते माणसालाच.

अनेक जण सकाळ, संध्याकाळ ठराविक वेळी, ठराविक रस्त्याने फिरायला जातात. यावेळी काही चेहरे नियमित दिसतात. पण आपसात ओळख मात्र नसते. असा ओळख नसलेला पण नेहमीचा चेहरा दिसला नाही तर थोड वेगळ वाटतंच. कारण… नेहमी दिसणारा माणूस आज दिसत नाही. यावेळी सुध्दा नजर  शोधत असते ती त्या माणसाला.

माणसाला मोठं करण्यात माणसाचाच हात असतो. यातही सगळ्यात महत्वाचा हात असतो तो शिक्षक या माणसाचा. एक शिक्षक एकावेळी अनेकांना मोठं करण्याचं स्वप्न उराशी बाळगून असतो. तो सुद्धा  माणूसच घडवत असतो.

माणूस, भांडला तरी भांडतो माणसाशीच. यात चुकणारा, त्याला समजवणारा, आणि समेट घडवणारा असतो तो माणूसच.

आनंदाच्या वेळी मिठी मारत पाठीवर ठेवलेला, आणि संकटात खांद्यावर ठेवलेला एक हात बरंच काही सांगून जातो. तो हात असतो माणसाचा.

फक्त आपण माणूस आहे याची जाणीव ठेवायला हवी. कारण सोबत हवा असतो तो माणूस…

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘ओटी आईची…’ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

?विविधा ?

☆ ‘ओटी आईची…’ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

आजपासून अधिक महिन्याची सुरूवात! गेला आठवडाभर वाॅटसपवर याविषयी वेगवेगळे लेख आणि माहिती वाचतेय. अधिक महिन्यात काय काय करावं, म्हणजे कोणती व्रतवैकल्ये करावी, पोथ्या-पुराण वाचावी, जावयाला ३३ जाळीदार वस्तूंचं वाण द्यावं इ.इ. त्याचबरोबर फक्त अधिक महिन्यात लेकीनं आईची ओटी भरावी, आईला साडी घ्यावी, असंही वाचलं. अन् मन विचाराच्या भोवऱ्यात गरगरायला लागलं.

अशी साडी वगैरे देऊन अधिक महिन्यात तुझीओटी भरण्याचा एखादाच प्रसंग मी अनुभवला असणार. कारण ठळकपणे असं फारसं आठवत नाहीये.  माझ्या लग्नानंतर जेमतेम ६ वर्षांनीच तू देवाघरी गेलीस.

माझा याप्रकारे कृतज्ञता व्यक्त करण्याला अजिबात आक्षेप नाही. पण खरंच का अश्या ओटी भरण्यानेच फक्त आईबद्दल कृतज्ञता व्यक्त होते. आणि माझ्या मनाने ठामपणे याचं उत्तर *नाही * असं दिलं.

लग्नापूर्वी तर तुझ्यासोबतच राहात होते. पण संसारात पडल्यावर क्षणोक्षणी तुझी आठवण येतच राहिली. *लेकरासंगे वागताना थोडी थोडी समजत जातेस * असं सहजपणे लिहून गेले माझ्या कवितेत ते उगाच नाही. तू आपल्या वागण्यातून रूजवलेले संस्कार, नक्कीच माझं आयुष्य सुंदर करत गेले आणि आजही करत आहेत.

अगदी लहान वयात तू लावलेली वाचनाची सवय, आयुष्यातील अनेक अवघड परीक्षा यशस्वीपणे पास होण्यासाठी नकळत कारणीभूत ठरली. कारण आलेल्या प्रसंगाला खंबीरपणे तोंड देण्यासाठी विचार करण्याची कुवत आणि वैचारिक बैठक त्यातूनच तयार झाली. तुझं स्वतःचं उदाहरण तर नेहमीच माझ्या डोळ्यांसमोर असतं.

मराठी आणि हिंदी भाषांवरील तुझं प्रभुत्व, शुद्धलेखनाचा आग्रह, यामुळेच माझ्या लेखनात सहसा शुद्धलेखनाची चूक आढळत नाही. याआणि जी काही कमतरता राहते, तो नक्कीच माझा आळशीपणा किंवा अज्ञान. पण या  गोष्टींसाठी प्रशंसा होते तेव्हा तेव्हा तुझ्या आठवणीने नेहमीच डोळे भरून येतात. 🥲😢

परिस्थितीनं नववीतच शिक्षण सोडायला लागलं तरी आपल्या अखंड आणि अफाट वाचनामुळे तू मिळवलेलं ज्ञान आणि वैचारिक समृद्धी, ही अनेक शैक्षणिक पदव्या मिळवलेल्या व्यक्तींपेक्षाही कितीतरी उच्च दर्जाची होती, हे मला पदोपदी जाणवतं. म्हणूनच अगदी लहान वयात आमच्या हाती श्रीमान योगी, स्वामी, झेप, मृत्युंजय यासारखी पुस्तकं होती.  चौथीला स्काॅलरशिप मिळाल्यावर तू घेऊन दिलेलं साने गुरुजींचं, चित्रा आणि चारू, हे पुस्तक उदात्त प्रेम आणि मैत्री कशी असते, असावी हे नकळत शिकवणारं!

स्वतःसाठी पुरेसं नसतानाही, त्यातलंच दुसऱ्याला देऊन मदत करण्याची तुझी सह्रदयता, माणुसकी या गोष्टी मनावर कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. मग ती साधी वाटीभर आमटी, कामवाल्या राधाबाईंसाठी मुद्दाम काढून ठेवण्याची गोष्ट असो की आणखी काही!

आम्हां पाचही मुलींना पदवीपर्यंतचे शिक्षण देऊन ताठ मानेनं, स्वाभिमानानं जगायला शिकवताना, बाबा आणि तू, दोघांनी  सोसलेल्या अडचणी आणि केलेल्या त्यागाला तोडच नाही. त्या ऋणातून उतराई होणं या जन्मी तरी जमेल असं वाटत नाही ग! 🙏

असे संस्कार घडवणारी आई लाभणं हे आमचं महद्भाग्य! असे कितीतरी प्रसंग आणि आठवणी! कोणीतरी म्हटल्याप्रमाणे *आकाशाचा केला कागद, समुद्राची केली शाई, तरी लिहून होणार नाही,आई तुझी थोरवी!  पण  माझी ही शब्दरूपी ओटी तुला समाधान देईल, असा मला विश्वास आहे.

आणि हो हे वाचून, सगळ्या मुलामुलींना शब्दांत व्यक्त करता आलं नाही तरी, आपापल्या आईची  आठवण काढून ते तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतील याची मला खात्री वाटते. ज्यांच्या नशिबी अजून मातृसौख्य आहे, ते भाग्यवान या निमित्ताने पुन्हा एकदा आईच्या कुशीत शिरण्याचा सुखद अनुभव घेतील. तिची प्रेमानं, आपुलकीनं चौकशी करतील आणि काळजीही घेतील. बाकीचे तिचे स्मरण करून, तिच्या संस्कारांचा वसा चालू ठेवतील, तर ही ओटी सुफळ संपूर्ण होईल.

© सुश्री प्रणिता खंडकर

दि. १८/०७/२०२३

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

ही कथा आवडल्यास लेखिकेच्या नावासह आणि कोणताही बदल न करता अग्रेषित करण्यास हरकत नाही.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares