मराठी साहित्य – विविधा ☆ वा द ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

☆ 🤣😲वा द !😢😂 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“सुईच्या अग्रावर राहील इतकीसुद्धा जमीन मिळणार नाही तुम्हांला !”

बघा, म्हणजे जमिनीच्या मालकीवरून आजच्या कलियुगीच वाद होतात असं नाही, तर महाभारत काळापासून हा रोग तमाम मानवजातीला जडला आहे असं म्हटलं तर यात वाद व्हायचं कारणच नाही. पण सुईच्या अग्रापेक्षासुद्धा या पृथ्वीतलावर आणखी कमी क्षेत्रफळाची जागा असते, हे तेव्हाच्या लोकांना माहित नव्हतं. त्यामुळे तेंव्हाच विज्ञान आजच्या इतकं खाचितच प्रगत नव्हतं हेच यातून सिद्ध होतं. मंडळी थांबा थांबा, हे काही माझं मत नाही बरं, नाहीतर तुम्ही माझ्याशी या विषयावर उगाचच वाद घालायला लागाल, काय सांगावं ! तर ते एखाद्या जन्माने मुळच्या “पेठेत” राहणाऱ्या पण सध्या सिलिकॉन व्हॅलीमधे वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेल्या भारतीयाच मत असू शकतं, हे मात्र माझं मत.

महाभारतकाळी इतक्या कौरवांचे आणि पांडवांचे जन्म झाले त्यावरून चांगल्या “सुईणी” तेंव्हा होत्या का नव्हत्या हा वादाचा मुद्दाच होऊ शकत नाही मंडळी, पण महाभारतकाळात “सुई” अस्तित्वात होती का नव्हती, असा वादाचा मुद्दा कोणी उपस्थित केला तर ? त्यामुळे तिच्या अग्रावर राहील इतकी जमीन हे परिमाण, महाभारताचे नाटकीकरण करतांना त्या पात्राच्या तोंडी घालण्याची त्याच्या लेखकांने त्याकाळी घेतलेली ती रायटर्स लिबर्टी म्हणायची का ? आणि ती तशी घेतली असेल तर त्याला तो अधिकार कोणी, कधी दिला ? लेखी दिला का तोंडी दिला ? आणि जे असे परिमाण अस्तित्वातच नाही त्याला जन्माला घालून लेखकांने काय साधले ? दुसरं असं की त्यामुळे रायटर्स लिबर्टीचा जन्म महाभारत कालीन मानायचा का ? असे नानाविध वादाचे मुद्दे या अनुषंगाने उभे राहतात. त्याची उत्तरे कोण देणार आणि तशी उत्तरे देण्याइतका त्याचा किंवा तिचा या बाबतीत अधिकार आहे का ? आणि तो तसा असेल, तर तो त्याला किंवा तिला कोणी बहाल केला ? असे अनेक वादाचे पोट-मुद्दे सुद्धा सुज्ञ वाचकांच्या पोटात खड्डा पाडू शकतात मंडळी !

तर थोडक्यात काय, तर कुठल्याही गोष्टीतून कोणाला वादच उकरून काढायचा असेल, तर तो त्याला कसाही उकरून काढता येतो, इतकंच मला वाचकांच्या मनावर ठसवायचं होतं ! आता ते तसं ठसवण्यात मी यशस्वी झालोय का नाही, हा पुन्हा वादाचा मुद्दा ! पण बहुतेक सु्बुद्ध वाचकांना माझं म्हणणं पटावं आणि ज्यांना ते पटणार नाही त्यांनी नवीन मुद्दे मांडून नवीन वाद, मी सोडून, कुणाशीही घालायला माझी काहीच हरकत नाही, या बद्दल मात्र नक्की वादच नाही !

वाद ! ह्याच खतपाणी मुलांच्या मनांत बहुतेक त्यांच्या वयात यायच्या वयात, म्हणजे साधारण आठवी नववीमधे शाळेतूनच घातलं जात. मी असं म्हणतोय म्हणून तुम्ही या विषयावर माझ्याशी वाद घालायच्या आधीच, मी असं का म्हणतोय ते सांगतो. आठवा ती शाळेत होणारी “वाद विवाद स्पर्धा. ” ज्यात भाग घेण्यासाठी (भांडखोर ?) शिक्षक आपापल्या वर्गातून मुलं तयार करायचे. नंतर नंतर तर “आंतर शालेय वाद विवाद स्पर्धेत” एखाद्या शाळेला ढाल मिळाल्यावर, (तेंव्हा चषकाची आयडिया रूढ व्हायची होती) तर काय विचारूच नका. ज्या मुलांनी शाळेला “ढाल” मिळवून दिली त्यांचा सत्कार शाळेतर्फे केला जायचा ! वाचकांपैकी माझ्या पिढीतील काही लोकांनी अशी “ढाल” आपल्या शाळेला मिळवून देण्यात, स्वतःच्या “जिभेची तलवार” तेंव्हा चालवली असण्याची शक्यता नाकारता येत नाही मंडळी. मी मुळातच मवाळ स्वभावाचा असल्यामुळे अशा स्पर्धेपासून कायम चार हात दूरच रहायचो. त्यामुळे मला काही मुलं तेंव्हा, माझ्या अपरोक्ष मुखदुर्बळ म्हणायचे, असं मला नंतर समजलं. पण अशा वाद विवादस्पर्धा फक्त ऐकून त्यातून आपल्या ज्ञानात काही भर पडत्ये का बघावं ह्या एकाच विचाराने मी अशा स्पर्धेत भाग घेण्यापासून दूर राहिलो ते आज पर्यंत ! असो !

पुढे कॉलेजमधेसुद्धा “आंतर महाविद्यालयीन वाद विवाद” स्पर्धेतून, आता चारबुक जास्त शिकलेल्या आणि मिसरूड फुटलेल्या तरुणांना, तेंव्हा नाकातोंडातून निकोटीनचा धूर काढायचं प्रमाण फारस वाढलं नव्हतं म्हणून असेल, पण आपल्या डोक्यातली गरम विचारांची वाफ, अशा स्पर्धेतून आपल्या तोंडातून काढायची संधी मिळत असे. आणि त्याचा पुरेपूर उपयोग काही तरुण त्याकाळी करत असतं. त्यातील काही जणांचा यामागे आपल्या आवडत्या कॉलेज क्वीनवर इंप्रेशन मारायचा छुपा अजेंडा असायचा. अशापैकी काही तरुण आपल्या छुप्या अजेंड्यात नंतर यशस्वी होऊन आपल्या क्वीनबरोबर यथावकाश लग्न करून मोकळे सुद्धा झाले ! पण आपल्या क्वीन बरोबरच्या लग्नानंतर आता झालेल्या बायकोबरोबर अगदी कुठल्याही क्षुल्लक विषयावरचा झडलेला वाद सुद्धा, त्यांना आजतागायत कधीच जिंकता आलेला नाही, हे मला नंतर कळलं ! आता त्या दोघांच्या वाद विवादात जास्त खोलात न शिरता पुढे सरकतो, नाहीतर असा एखादा स्वतःच्या बायकोबरोबर घरच्या वादात कायम हरलेला नवरा, त्या रागापोटी माझ्याशी उगाचच नवीन वाद उकरून काढायचा !

“वादे वादे जायते तत्वबोध:” हे आपल्या देशात अर्वाचिन काळापासून चालत आलेले तत्व होते. पण आजकाल कुठल्याही वादाचे स्वरूप निकोप न राहिल्यामुळे त्याचे वितंड वादात रूपांतर व्हायला लागले आहे. जगात असा कुठलाही वाद नाही की ज्याचे उत्तर सुसंवादातून मिळणार नाही. पण मी म्हणतो तेच खरे असा आग्रह धरून कोणी वाद विवाद करत असेल तर त्यातून कुठलाही वाद हा विकोपालाच जाणार आणि त्याच पर्यवसान कधी कधी दोघांच्याही अंताला सुद्धा कारणीभूत ठरू शकत. याची काही उदाहरणं आपण इतिहासात वाचली असतीलच. पण त्यातून धडा घेण्याऐवजी लोकं आपला हेका न सोडता वाद विकोपाला जाईपर्यंत ताणतात हे ही तितकंच खरं.

शेवटी इतकंच म्हणावंस वाटत की, कुठल्याही वादावर पडदा पाडायची “दवा” “वाद” हा शब्द आपण उलटा वाचलात तर त्या उलट्या शब्दातच आहे, हे आपल्या लक्षात येईल ! पण त्यासाठी वाद विवाद करणाऱ्या लोकांनी आपापलं डोकं शांत ठेवून, समोपचाराने कुठलाही वाद, प्रसंगी दोघांनी दोन दोन पावलं मागे जाऊन, तो वाद सोडवायचा प्रयत्न मनापासून करणं गरजेचे आहे, हे लक्षात ठेवायला हवे !

आपल्या सर्वांचा माझ्या सकट दुसऱ्याशी, कायम सुसंवादच घडो हीच सदिच्छा !

शुभं भवतु !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ३७ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ३७ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- किर्लोस्करवाडी येथील आमच्या आठ वर्षांच्या वास्तव्यात आम्हा कुटुंबियांशी मनाने जोडले गेलेले हे पाटील कुटुंब. १९६७ मधे आम्ही कि. वाडी सोडल्यानंतर त्या कुणाशीच भेटी सोडाच आमचा संपर्कही रहाणे शक्य नव्हतेच. पण याला लिलाताई मात्र अपवाद ठरली होती!)

लिलाताईचं हे असं अपवाद ठरणं खूप वर्षांनंतर पुढं कधीतरी माझ्या संसारात घडणार असलेल्या दु:खद घटनेतून मला सावरुन जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्म या संकल्पनांमधे लपलेलं गूढ ओझरतं तरी मला जाणवून देण्यास ती निमित्त ठरावी अशी ‘त्या’चीच योजना होती! ‘त्या’च्या या नियोजनाचे धागेदोरे लिलाताईशी आधीपासूनच असे जोडले गेलेले होते हे त्या आश्चर्यकारक घटनाक्रमानंतर मला मनोमन जाणवलंही होतं! आज या लेखनाच्या निमित्तानं हे सगळं पुन्हा जगताना दत्त महाराजांच्या माझ्यावरील कृपालोभाचं मला खरंच खूप अप्रूप वाटतंय!

या सगळ्यातली लिलाताईची भूमिका समजून घेण्यासाठी भूतकाळातल्या पाटील कुटुंबियांच्या आणि विशेषत: लिलाताईसंबंधीच्या आठवणींचा मागोवा घेणं आवश्यक आहे.

हे पाटील कुटुंब आर्थिकदृष्ट्या कनिष्ठ स्तरापेक्षाही खालच्या स्तरातलं. तरीही कष्ट करीत मानानं जगणारं. लिलाताईच्या आईबाबांचा त्यांच्या लहानपणी सर्रास रुढ असलेल्या बालविवाहाच्या प्रथेनुसार नकळत्या वयातच लग्न झालेलं होतं. लिलाताई मोठ्या भावाच्या पाठीवरची आणि बहिणींमधे मोठी. एकूण पाच बहिणी आणि सहा भाऊ असं ते तेरा जणांचं कुटुंब. वडील किर्लोस्कर कारखान्यात कामगार. जेमतेम पगार. आर्थिक ओढाताण कधीच न संपणारी. सततच्या बाळंतपणांमुळे आई नेहमी आजारी. त्यामुळे घरची सगळी कामं लिलाताई आणि तिच्या पाठची बेबीताई दोघी शाळकरी वयाच्या असल्यापासूनच त्यांच्यावर येऊन पडली होती. हे सगळं सांभाळून अभ्यासही करणं झेपेना म्हणून बेबीताईने सातवी नापास झाल्यावर शाळा सोडलेली. लिलाताई मात्र अभ्यासात अतिशय हुशार. वर्गात नेहमीच पहिला नंबर. फक्त अभ्यासच नाही तर गाणं, वक्तृत्त्व, चित्रकला सगळ्याच स्पर्धांमधे तिचा पहिला नंबर ठरलेला. अतिशय शांत, सोशिक, हसतमुख, सात्विक वृत्तीची आणि स्वाभिमानी. मराठा कुटुंबात लहानाची मोठी होऊनही पूर्ण शाकाहारी. इंग्रजी, गणित, मराठी सगळ्याच विषयांवर तिचं प्रभुत्त्व! त्यामुळे शाळेतले मुख्याध्यापक आणि शिक्षक सर्वांचीच ती आवडती होती!

पण म्हणून अभ्यासाचं निमित्त करून तिने घरची कामं कधीही टाळली नाहीत. पाठच्या बहिणीच्या बरोबरीने पुढाकार घेऊन सगळ्या भावंडांची आणि घरकामाची जबाबदारी ती समर्थपणे आणि तेही हसतमुखाने पार पाडत राहिली. ती नववी पास होऊन दहावीत गेली तेव्हा दहावीत नापास झालेला तिचा मोठा भाऊ तिच्याच वर्गात आलेला. पुढे अकरावीत गेल्यावर (त्या वेळची मॅट्रिक) स्वतःबरोबरच त्यालाही अभ्यासात मदत करीत ती ते वर्ष पूर्णतः अभ्यासात व्यस्त राहिली. खूप शिकून मोठ्ठं व्हायचं आणि आपल्या घराला गरिबीच्या खाईतून बाहेर काढायचं हे तिचं एकमेव स्वप्न होतं! पण तसं व्हायचं नव्हतं. उलट त्या गरिबीच्याच एका अनपेक्षित फटक्याने तिचं स्वप्न चुरगाळून टाकलं. याला त्याच्याही नकळत निमित्त झाला होता तो तिच्याच वर्गात शिकणारा हाच तिचा मोठा भाऊ आणि रूढी-परंपरा न् सामाजिक रितीरिवाजांचा पगडा असणारे, सरळरेषेत विचार करीत आयुष्य ओढणारे तिचे कष्टकरी वडील! कारण मॅट्रिकच्या परीक्षेसाठी बोर्डाच्या परीक्षेचा फॉर्म भरायचा शेवटचा दिवस जवळ येत चालला तरीही दोघांच्या फाॅर्म फीच्या पैशांची सोय झालेली नव्हती. खरंतर वडील त्याच चिंतेत आतल्या आत कुढत बसलेले. अखेर फॉर्म भरायचा शेवटचा दिवस उजाडला तेव्हा सकाळी सात वाजता कारखान्यांत कामाला निघालेल्या वडिलांना लीलाताईने आज फॉर्म भरायची शेवटची तारीख असल्याची आठवण करुन दिली. “दुपारच्या जेवायच्या सुट्टीपर्यंत मी कांहीतरी व्यवस्था करतो” असं सांगून त्याच विवंचनेत असलेले वडील खाल मानेने निघून गेले.

पण पैशाची कशीबशी सोय झाली ती फक्त एका फाॅर्मपुरतीच. मुलीपेक्षा मुलाचं शिक्षण महत्त्वाचं म्हणून वडिलांनी तिच्या मोठ्या भावाचा फॉर्म भरायला प्राधान्य दिलं. ‘ तू हवं तर पुढच्या वर्षी परीक्षेला बस’ असं हिला सांगितलं.

ती आतल्या आत कुढत राहिली. अभ्यास, परीक्षा या सगळ्यावरचं तिचं मनच उडालं.

मुख्याध्यापकांना सगळं समजलं तोवर खूप उशीर झाला होता. ते

तिच्यावर चिडलेच. ‘तू लगेच माझ्याकडे कां नाही आलीस? मला कां नाही सांगितलंस? मी फाॅर्मचे पैसे भरले असते’ म्हणाले. पण तोवर वेळ निघून गेलेली होती. नशिबाला दोष देत तिने तेही दुःख गिळलं. आपले वडील वाईट नाहीयेत, दुष्ट नाहीयेत हे स्वतःच्याच मनाला परोपरीने समजावून सांगितलं. नंतरच्या वर्षी मॅट्रीकची परीक्षा पास झाली पण परिस्थितीचा विचार करून नाईलाजाने तिने तिथेच आपलं शिक्षण थांबवलं!

शिक्षण थांबलं तरी स्वत: पूर्णवेळ गरजवंत घरासाठीच नाही फक्त तर स्वत:चा आनंद शोधत ती स्वत:साठीही जगत राहिली. भल्या पहाटे उठून घरासमोरच्या अंगणात सडा रांगोळी घालणं हे तिचं ठरलेलं काम. अंगणात रोज रेखाटलेल्या नवनव्या रांगोळ्या हे संपूर्ण कि. वाडीत वाखाणलं जाणारं तिचं खास वैशिष्ट्य होतं. तिच्या चिमटीतून अलगदपणे झरझर झिरपणाऱ्या रांगोळीच्या रेखीव अशा वळणदार रेखाकृतींमधले आकर्षक आकृतीबंध दृष्ट लागण्याइतके सुंदर असत. काॅलनीतले सगळेच ओळखीचे. त्यामुळे रस्त्यावरुन येणाजाणाऱ्या सर्वांच्याच नजरा आणि पाऊले पाटलांच्या अंगणाकडे हमखास वळायचीच!शिवणकला तर तिने निदान प्राथमिक तंत्र शिकून घेण्याची संधी मिळालेली नसतानाही सरावाने शिकून घेत त्याला कल्पकतेची जोड देऊन त्यात प्राविण्य मिळवलं होतं. त्याकाळी ‘फॅशन डिझाईन’ या संकल्पनेचा जन्मही झालेला नव्हता तेव्हाची ही गोष्ट. तिच्या कल्पनेतून साकारलेल्या विविध आकर्षक फॅशन डिझाईन्सवर तिच्या रांगोळ्यांतल्या आकृतीबंधांवर असायचा तसाच खास तिचा असा ठळक ठसा उमटलेला असे!

गणित हा विषयतर तिच्या आवडीचाच. त्याकाळी शिकवण्यांचं प्रस्थ रुढ नव्हतं झालेलं. तरीही अगदीच कुणी गळ घातली तर ‘मी माझं काम करता करता शिकवणार’ या अटीवर ती दरवर्षी अकरावीतल्या एक-दोन मुलांसाठी गणिताची स्पेशल ट्युशन घ्यायची. याखेरीज आपल्या सर्व भावंडांचा ती स्वत: अभ्यास घ्यायची तो वेगळाच. यातून महिन्याभरांत होणारी तिची कमाई वडिलांच्या तुटपुंज्या पगाराच्या जवळपास असायची जी घरासाठीच खर्चही व्हायची.

लिलाताईचीही दत्तावर अतिशय श्रध्दा होतीच. तिच्या रोजच्या कामांच्या धबगडयांत नित्यनेमांना कुठून वेळ असायला? मात्र आमच्या अंगणात दत्तपादुकांची

प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून अंत:प्रेरणेनेच असेल पण कांही विशिष्ट संकल्प न सोडताही अगदी साधेपणाने लीलाताईचा नित्यनेम सुरु झाला होता. रोजचं सडासंमर्जन होताच ती आधी स्नान आवरुन पादुकांची पूजा संपण्यापूर्वीच बाहेर येऊन उभी रहायची आणि माझ्या बाबांनी तिला तीर्थप्रसाद देताच प्रदक्षिणा घालून एकाग्रतेने हात जोडून नमस्कार करायची. तिचा हा नित्यनेम पुढे अनेक दिवस न चुकता निर्विघ्नपणे सुरूही होता. पण एक दिवस अचानक याच पाटील कुटुंबाचं स्वास्थ्य नाहीसं करणारी ‘ती’ विचित्र घटना घडली.. ! म्हटलं तर एरवी तशी साधीच पण लिलाताईचं आत्मभान जागं करीत त्या घरालाच हादरा देऊन गेलेली!!

तो प्रसंग तिच्या दत्तगुरुंवरील श्रद्धेची कसोटी पहाणारा ठरला होता आणि माझ्या बाबांकडून तिच्या विचारांना अकल्पित मिळालेल्या योग्य दिशेमुळे ती त्या कसोटीला उतरलीही!

तो दिवस न् ती घटना दोन्हीही माझ्या मनातील लिलाताईच्या आठवणींचा अविभाज्य भाग बनून गेलेले आहेत!

 क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रिय डिसेंबर… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

?  विविधा ?

☆ प्रिय डिसेंबर… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

प्रिय डिसेंबर महिना,

कितीरे वाट पहायला लावतोस

अगदी वर्षाच्या शेवटी येतोस बघ..

बारा भावंडातील शेंडेफळ ना. म्हणून सर्वांचा लाडका..

हिरव्यागार निसर्गाच्या पायघड्यांवरून धुक्याची शाल लपेटून गुलाबी थंडी पसरवत एखाद्या रूपगर्वितेसारखा दिमाखात येतोस,

सर्वांना भरभरुन चैतन्य व उत्साह देतोस अगदी हातचे काही न राखता…

भरपूर खा… प्या… व्यायाम करा असा संदेश घेऊन तू येतोस त्यामुळे दिवाळी नंतर आलेली मरगळ झटकून गृहिणी परत लगबगीने खाद्य पदार्थ करायला लागतात

सुरुवात होते ती डिंकाच्या लाडवाने बाजरीचा भात वांग्याचे भरीत मिरचीचा ठेचा त्याबरोबर गरम गरम भाकरी हुलग्याचे शिंगोळे वेगवेगळ्या चटण्या यामुळे रसना तृप्त होते

हा स्वर्गिय आनंद फक्त तूच देऊ शकतोस

हुरडा पार्टी तर तुझ्या शिवाय होतच नाही आणि पतंगोत्सव तो तुला मानाचा शिरपेच देऊन जातो

रात्री शेकोटीच्या भोवती बसून मारलेल्या गप्पा गाणी यांचा आनंद केवळ अवर्णनीय…

अश्या सर्व उत्साहवर्धक वातावरणातच तुझ्या मुळे दत्तजयंतीच्या निमित्ताने श्री दत्तगुरुंचे कृपाशिर्वाद आम्हाला मिळतात

नाताळ हा सण जायच्या आधी तू आम्हाला तो भेट म्हणून देतोस. तुझ्यावरच्या प्रेमाने आम्ही तो स्वीकारतो आणि सांताक्लाँजच्या प्रेमात पडून नाताळचा आनंद घेतो

तू आम्हाला खूप जवळचा वाटतोस… वर्षभरातील सर्व गुपिते उघड करण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे तू…

वर्षभरातील केलेल्या घटनांची तसेच चुकांची कबुली व नवीन संकल्प तुझ्याच साक्षीने होतात

चांगल्या वाईट गोष्टींचा पाढा तुझ्या समोरच वाचला जातो

पण सर्व माफ करुन नवीन उमेद तूच देतोस. आणि येतो तो तुला निरोप देण्याचा दिवस…

तुझ्या मुळेच आम्हाला नवीन वर्ष चुका सुधारण्याची संधी नवी स्वप्ने साकारण्याची जिद्द मिळते..

आम्ही धूमधडाक्यात तुला निरोप देतो. या कृतज्ञता सोहळ्यात गुंग असतानाच तू हुलकावणी देऊन निघून जातोस… हुरहुर लावून… मन हळवे करुन…

सदैव तुझ्या प्रेमात,

 

🌹🌹

लेखक : अज्ञात 

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ व्रतोपासना – ४. घराची निंदा करू नये ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

व्रतोपासना – ४. घराची निंदा करू नये ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

जरा वेगळे वाटते ना? पण आपण स्वतःशी थोडा विचार केला तर किंवा काही लोकांचे बोलणे ऐकले तर आपल्याला लक्षात येते, की घराला सहज नावे ठेवली जातात. किंवा काही मंडळी इतरांच्या घराशी आपल्या घराची तुलना करतात आणि घरी बोलावण्याचे टाळतात.

आज आपण हा विचार करु या. आपण जेथे राहतो त्या घरात आपल्याला कसे वाटते. या घराने आपल्याला काय काय दिले? आपली किती सुख दुःखे आपल्या बरोबर अनुभवली आहेत? आपल्याला किती संरक्षण, आधार दिला आहे. लहान मुलांना तर स्वतःचे घर खूप प्रिय असते. लहान मुले वैश्विक शक्तीशी जोडलेली असतात. घरातील चांगली ऊर्जा त्यांना समजते. आपल्याला घर निर्जीव वाटत असेल तरी त्यालाही भावना असतात. ते आपल्याशी बोलते. जसे आपण नवी खरेदी केली की आपल्याला आनंद होतो तसेच घरही प्रसन्न होते. घराची स्वच्छता केली, रंग दिला किंवा घरातील वस्तूंच्या जागा बदलल्या तरी आपण म्हणतो घराची ऊर्जा बदलली आहे. घरात छान प्रसन्न वाटत आहे. असे बरेच प्रसंग आपल्याला आठवतील. घराची विविध रुपे आपण अनुभवतो. पण लक्षात घेत नाही. आणि कधी कधी घराची निंदा करतो. अगदी सहज या घराने मला काय दिले? असे वैतागाने म्हणून जातो. त्यावेळी घर नाराज होते. आपले पूर्वज कायम म्हणतात, वास्तू नेहेमी तथास्तू म्हणत असते. म्हणून चांगले बोला आपले पूर्वज फार महत्वाचे सांगत होते. त्यांचे सगळे सांगणे शास्त्रावर आधारित होते. त्यामुळे घराची निंदा करु नये. हे खूप महत्वाचे वाटते. या. साठी पुढील काही संकल्प महत्वाचे वाटतात.

घरासाठी संकल्प

घरात सगळेजण देवाचे करतात. पोथी वाचन अनेक वर्षे सुरु आहे. घरात सुबत्ता आहे. सर्व भौतिक सुविधा आहेत. हे सगळे असले तरी एखादा छोटासा किंतू असतो. आणि सर्व सुखांच्या आड येणारे हेच असते. थोडक्यात म्हणजे सगळे उत्तम आहे, पण….. असे ऐकू येते. आणि हा पण म्हणजे पाणी साठ्यातून जसे पाणी झिरपते तसे असते.

तर या झिरपणाऱ्या पाण्याला/पणला /किंतूला दूर करु या.

या साठी काही गोष्टी करु या.

आपण देवपूजा, पोथी वाचन आरती किंवा अजून काही करत असू तर ते उत्तमच आहे. पण एक असे असते या सगळ्याची ठराविक वेळ असते. त्या वेळी आपले विचार अत्यंत उत्तम, सकारात्मक असतात. पण हे सगळे झाल्यावर नंतर पुन्हा असे विचार कधी करतो? याचा विचार प्रत्येकाने करावा. या गोष्टी आपण दिवसातून एकदा किंवा दोनदा करतो. पण आपण पाणी पिणे, चहा घेणे, जेवणे, झोप घेणे अशा आणि काही आवश्यक गोष्टी वारंवार करतो. मग आपल्या कुटुंबा विषयी असे सकारात्मक विचार (संकल्प) सुद्धा सतत करायला हवेत.

घरातील व्यक्ती एकमेकांशी मैत्रीपूर्ण वागणे. आनंदाने संवाद करणे, एकमेकांमचा सर्वांनी स्वीकार करणे या साठी काही संकल्प पुढील पद्धतीने करु या. कोणतीही पद्धत किंवा जमेल त्या पद्धती वापराव्यात.

घरात दर्शनी भागात सर्व सदस्य असतील असा फोटो लावणे. म्हणजे आनंदी फॅमिली फोटो घरात लावावा.

काही सकारात्मक वाक्ये नेहेमी उच्चारावीत. ही वाक्ये पुढील प्रमाणे.

▪️ आमचे घर हे एक पवित्र मंदिर आहे.

▪️ मी व घरातील प्रत्येक व्यक्ती पवित्र व शक्तिशाली वैश्विक शक्तीचा अंश आहेत.

▪️ सगळे सुखी व आनंदी आहेत.

▪️ सगळे एकमेकांना समजून घेत आहेत.

▪️ सगळ्या सदस्यांचे एकमेकांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

▪️ घरातील प्रत्येकाला त्यांच्या मनाप्रमाणे सुख व समाधान मिळालेले आहे.

▪️ आम्ही सगळे कायम एकमेकांच्या सोबत आहोत.

▪️ अशा घरात व घरातील सदस्यांच्या सोबत मी रहात आहे. त्या साठी देव/निसर्ग शक्ती / वैश्विक शक्ती यांचे मनापासून आभार!

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

९/११/२०२४

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ एका ‘ जोकर ‘ च्या जन्मशताब्दी निमित्त… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ एका ‘ जोकर ‘ च्या जन्मशताब्दी निमित्त ☆ सौ कल्याणी केळकर बापट

चित्रपट बघायला वेळ,पैसा ह्यापेक्षाही जास्त त्याची आवड असावी लागते. आणि काही विशिष्ट चित्रपटप्रेमी चोखंदळ प्रेक्षक वर्ग हा तर अतिशय बारकाईने, आवडीने दर्जेदार चित्रपट हे हुडकून काढून बघतो. दर्जेदार चित्रपट हुडकतांना त्या चित्रपटाचे कथानक, दिग्दर्शन, काम करणारे कलाकार ह्यांचा प्रामुख्याने ह्या निवडीत विचार केला जातो.

अशाच एका ह्या क्षेत्रात सर्वगुणसंपन्न असलेल्या अवलियाचा १४ डिसेंबर  हा जन्मदिवस . निळ्या डोळ्यांचा,भावूक,निरागस चेहऱ्याचा, सहजसुंदर अभिनय करणाऱ्या कलावंताचा, व ह्या सर्वांवर कडी करणाऱ्या दिग्दर्शकाचा ठसा हा एकाच व्यक्ती बघायला मिळणं म्हणजे खरोखरच दुर्गम्य बाब. परंतु ह्या सगळ्या बाबी “राजकपूर” ह्यांच्यात सामावलेल्या होत्या.

चित्रपटनगरी म्हणजे एक अफलातून वेगळीच दुनिया. उगाचच नाही तिला मायानगरी म्हणतं. चित्रपट म्हणजे एक अख्ख भलमोठं कुटूंबच असत जणू. कुटूंबाप्रमाणेच सगळी कामं ही वेगवेगळ्या लोकांनी वाटून घेतलेली असतात. ह्या क्षेत्राचे कायम आपल्या सामान्य जनतेला आकर्षण, उत्सुकता वाटत असते.

ह्या नगरीने आपल्याला खूप वेगवेगळे दिग्गज कलाकार, दिग्दर्शक, निर्माते दिलेत .पण ह्या सगळ्या गोष्टी एकाच व्यक्तीत आढळतील. अगदी आपल्या भाषेत बोलायचं तर ह्या क्षेत्रातील आँलराउंडर असलेली व्यक्ती म्हंटलं की चटकन प्रतिभावंत राजकपूर ह्यांच नाव नजरेसमोर येतं. १४ डिसेंबर,  राजकपूर ह्यांचा जन्मदिन.त्या निमित्ताने….

हाडाचा कलाकार, दर्जेदार, पट्टीचा अभिनेता  असलेल्या पृथ्वीराज कपूर ह्यांचे राजकपूर हे सुपुत्र. जणू जन्माला येतांनाच ह्या चित्रपट क्षेत्रातील बाळकडू घेऊनच आले होते. त्यांच्या सौंदर्याला एक वेगळीच निरागसतेची झालर होती. ते एक उत्कृष्ट, यशस्वी, अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता होते.

त्यांनी अनेक उत्कृष्ट, तिकीटबारीवर धूम करणारे,लोकप्रिय चित्रपट दिलेतं.त्यापैकी संगम,श्री 420,मेरा नाम जोकर, बाँबी,आवारा, हे सुपरडुपर हीट सिनेमे. संगम हा त्यांचा खूप गाजलेला, दिग्गज कलाकारांच प्रेमाचं त्रिकुट असलेला एक लोकप्रिय चित्रपट म्हणून गाजला “मेरा नाम जोकर  हा एक कारुण्यमय छान दर्जेदार चित्रपट.हा चित्रपट बघून माणसाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेम मिळणं,आपलं माणूस मिळणं हे किती आवश्यक असतं ह्याची प्रकर्षाने जाणीव होते. प्रेमात अयशस्वी झालेल्या व्यक्तीच्या स्वभावाला आपोआपच एक कारुण्याची झालर असते, हे ह्यातून ठळकपणे जाणवतं.ती व्यक्ती वरकरणी कितीही हसतं असली तरी आत किती दुःख, वेदना खोलवर दाबून ठेवलेली असते हे लक्षात येतं. राजकपूर ह्यांच्या बहुतेक सगळ्या चित्रपटांचा आत्मा म्हणजे उत्कृष्ट संगीत, गाणी,कसलेले कलाकार, आणि आशयपूर्ण पटकथा.

संगम चित्रपट लक्षात राहतो तो एक से एक अफलातून मस्त गाण्यांमुळे. राजकपूर ह्यांच्या निरागस,भाबड्या उत्कट प्रेमाच्या अभिनयामुळे अतिशय प्रेमरसानं ओथंबलेलं, भावपूर्ण गाणं “ये मेरा प्रेमपत्र पढकर”आणि अतिशय मिस्कील पणे गायलेलं”क्या करुँ राम मुझे बुढ्ढा मिल गया” ही गाणी म्हणजे ‘संगम’ च्या जमेच्या बाजू. संगम चित्रपटात वैजयंतीमाला,राजेंद्रकुमार आणि राजकपूर ह्या तिघांचही प्रेम अतिशय उत्कट. पण ते प्रेम दर्शविण्याच्या त-हा,पद्धती मात्र निरनिराळ्या. राजकपूर चे अतिशय मनापासून केलेले जगजाहीर उत्कट प्रेम, राजेंद्रकुमार चे अलवार, नाजूक, मनातल्या मनात केलेले प्रेम, आणि वैजयंतीमालाचे त्यागमय प्रेम खरचं अगदी लक्षात राहण्या सारखे. राजकपूर ह्यांच्या चित्रपटाबद्दल लिहायचं तर खरं पुस्तकही कमी पडेल.

राज कपूर हे हिंदी चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक होते.  त्यांना बॉलीवूडमधील शोमॅन म्हणून ओळखले जाते.  राज कपूर ह्यांच्या चित्रपटाच्या मनोरंजना आड काहीतरी संदेश असायचा.   आजही त्यांचे चित्रपट देशविदेशातील विविध चित्रपट महोत्सवांत दाखविले जातात, याचे कारण हेच आहे. राज यांच्या चित्रपटातील नायक हा सामान्य माणूस असायचा. फुटपाथ वर राहणारे, फेरीवाले, चहा विकणारे त्यांच्या चित्रपटात सर्रास आढळायचे.

राज कपूर यांना इ.स.१९८७ मेध्ये दादा साहेब फाळके पुरस्कार प्रदान केला गेला.

फिल्मफेअर सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक पुरस्कार प्रेम रोग,  मेरा नाम जोकर ,संगम, तसेच सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार जिस देश मे गंगा बहती है,अनाडी ह्या चित्रपटांसाठी मिळाला.

राजकपूर ह्यांच्या अभिनयात डोळ्यांची भाषा बोलली जायची.  तो रूपेरी पडद्यावर आला की सगळा पडदा आपल्या असण्याने व्यापून टाकायचा.

राज कपूर यांनी 1948 मध्ये आग या सिनेमातून  त्यांचं दिग्दर्शीय पदार्पण केलं. तर त्याआधी 1947 ला आलेला नील कमल हा नायक म्हणून त्यांचा पहिला सिनेमा होता. ते हयात असेपर्यंत हिंदी सिनेसृष्टीचं बॉलिवूड असं नामकरण झालेलं नव्हतं. त्या काळात नंबर वन, नंबर टू अशा स्पर्धाही नव्हत्या. दिलीप कुमार, देवआनंद, राज कपूर ही त्रयी 50, 60 आणि 70 चं दशक गाजवणारी ठरली. बाकी त्यांच्यावेळी जॉय मुखर्जी, प्रेमनाथ, राजेंद्र कुमार असे हिरोही होतेच. पण सगळ्यांना भुरळ पडली होती ती या त्रयीची. राज कपूर यांनी अभिनय करत असतानाच दिग्दर्शक म्हणूनही ते काम करत होते.1947 ला आपला देश स्वतंत्र झाला. त्यावेळी राज कपूर यांनी देशाच्या सिनेसृष्टीत योगदान देण्यास सुरूवात केली होती. सामाजिक आशय जपणारे अनेक सिनेमा त्यांनी दिग्दर्शित केले त्यात कामही केलं. आवारा, आह, बूट पॉलिश, श्री 420, जागते रहो या सगळ्या सिनेमांची जादू आजही कायम आहे.

राज कपूर यांच्या अभिनयावर काही प्रमाणात चार्ली चॅप्लिनचा प्रभाव होता. त्यांचा पेहराव, त्यांची टोपी, त्यांची हसण्याची पद्धत. निरागस चेहरा, फास्ट फॉर्वर्डमध्ये सिनेमातले काही सीन चित्रित करण्याची पद्धत हे सगळं काही चार्ली चॅप्लिनच्या शैलीशी मिळतंजुळतं होतं. मात्र ते सगळं आपण हसत हसत स्वीकारलं. कारण अभिनय, दिग्दर्शन आणि सिनेमा हे सगळं हा माणूस जगतो आहे हे आपल्याला ठाऊक होतं.

त्यांच्या काळातले ते सर्वात तरूण दिग्दर्शक होते.  संगम या सिनेमात राजेंद्र कुमार, वैजयंती माला आणि राज कपूर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. रूंजी घालणारं संगीत, मोहून टाकणारी गाणी आणि लोकेशन्स हे या सिनेमाचं वैशिष्ट्य. हर दिल जो प्यार करेगा वो गाना गाएगा, बोल राधा बोल संगम होगा के नहीं, मै क्या करूँ राम मुझे बुढ्ढा मिल गया, ये मेरा प्रेम पत्र पढकर, दोस्त दोस्त ना रहा अशी सगळी गाणी हिट ठरली. दोन मध्यंतर असलेला हा सिनेमा होता. 1964 मध्ये आलेल्या या सिनेमाने रेकॉर्ड मोडले होतं असं म्हणतात.

त्यांच्या यशस्वी सिनेमामध्ये बाँबी ह्याचा उल्लेख प्रामुख्याने होतो.बॉबीच्या यशानंतर राज कपूर यांनी सत्यम शिवम सुंदरम, प्रेम रोग, राम तेरी गंगा मैली हो गयी हे एका पाठ़ोपाठचे यशस्वी चित्रपट. बोल्डनेस हा त्यांच्या चित्रपटां मधला महत्त्वाचा भाग होता.

..

एकापेक्षा एक सरस चित्रपट, एकाहून एक सुमधुर गाणी आणि मनोरंजनाचा अखंड तेवत राहणारा वारसा ठेवून हा शोमन अनंताच्या प्रवासाला केव्हाच निघून गेला आहे. मात्र तो आपल्या मनात अजूनही जिवंत आहे त्याच्या नटखट, अवखळ डोळ्यांनी आपल्याला आपलंसं करत, मुकेशचा आवाज आपल्या हृदयात स्वतःचा म्हणून भिनवत..किमया करणारा… एखाद्या परीकथेतल्या राजकुमारासारखा! त्यामुळेच त्याच्या गाण्याच्या ओळी आठवतात.. त्याच्या मनात असण्याची साक्ष पटवतात…

कल खेल में हम हों न हों

गर्दिश में तारे रहेंगे सदा भूलोगे तुम,

भूलेंगे वो पर हम तुम्हारे रहेंगे सदा!

राजकपूर ह्यांच्या यशस्वी चित्रपटांची, सुमधुर गाण्यांची प्रकर्षाने आठवण होते हे खरे.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जा दू ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

☆ 👀👁️🤣 जा दू ! 💩🤠 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

 “जादू ssss तेरी नजर, खुशबू तेरा ssss बदन, तूं हां….. “

सॉरी, सॉरी, मंडळी, माफ करा मला ! आपण म्हणाल यात माफी मागण्या सारखं तुम्ही काय केलंय, म्हणून माफी मागताय ? सांगतो, सांगतो मंडळी. त्याचं काय आहे, मला खरं तर “जादू तेरी नजर” या, मतकरींच्या एका नाटकाच्या नावाने आजच्या लेखाची सुरवात करायची होती. पण वरच्या गाण्याच्या ओळींची “जादू” आज इतक्यावर्षांनी देखील, माझ्यासकट तमाम रसिकांवर त्या गाण्यातील शब्दांचे असं काही गारुड करून बसली आहे, की त्याची पुढची ओळ माझ्या हातून आपोआपच लिहिली गेली हे मी मान्य करतो आणि त्यासाठी मी तुमची माफी मागितली मंडळी ! चला, म्हणजे एका अर्थाने लेखाच्या सुरवातीलाच, एखाद्या गाण्याची अनेक तपानंतर सुद्धा आपल्यावर कशी “जादू” शिल्लक असते, हा एक मुद्दा निकालात निघाला ! अर्थात ते गाणं त्यातील शब्दांमुळे, संगीतामुळे, का ते ज्या कलाकारांवर चित्रित झालं आहे त्यांच्यामुळे, कां अजून कोणत्या गोष्टींमुळे रसिकांच्या मनावर आज तागायत जादू करून आहे हा वादाचा विषय होऊ शकतो, यात वादच नाही मंडळी. असं जरी असलं, तरी त्या गाण्याच्या जादूची मोहिनी आजच्या घडीपर्यंत टिकून आहे, हे आपण या लेखाद्वारे मी तुमच्यावर कुठल्याही प्रकारची शब्दांची जादू न करता सुद्धा मान्य कराल ! असो !

मंडळी, आपली माफी मागितल्या मागितल्या, मला एका गोष्टीची मनांत मात्र नक्की खात्री वाटत्ये आणि ती म्हणजे, आपण सुद्धा वरील गाण्याची पाहिली ओळ वाचताच, लगेच दुसरी ओळ मनांत नक्कीच गुणगुणली असेल, हॊ का नाही ? खरं सांगा ! बघा, मी जादूगार नसलो तरी “माझ्या” वाचकांच्या मनांत नक्की काय चाललं असेल ते ओळखण्या इतका मनकवडा जादूगार नक्कीच झालोय, असं लगेच माझं मीच म्हणून घेतो. दुसरं असं, की माझ्या मनावर अजून जरी जुन्या अनेकानेक अजरामर हिंदी गाण्यांची कितीही जादू असली आणि हिंदी आपली राष्ट्रभाषा असली तरी, राष्ट्रभाषेत लेख लिहिण्याइतकी काही त्या भाषेची माझ्यावर जादू झालेली नाही, हे मी मान्य करतो ! त्यामुळे आता या वयात अंगात नसलेली एखादी कला, कोणा जादूगाराच्या जादूने अंगी बाणेल, मग मी आपल्या राष्ट्र भाषेत एखादा लेख लिहीन यावर माझा 101% विश्वास नाही ! पण हां, स्टेजवरचे जादूचे प्रयोग पहात असतांना, हे सगळं खोटं आहे हे मनांला ठामपणे माहित असतांना देखील, माझे डोळे (चष्मा लावून सुद्धा) मात्र त्यावर विश्वास ठेवतात हे मात्र तितकंच खरं. म्हणजे असं बघा, रिकाम्या नळकांड्यातून फुलांचा गुच्छ काढणे, तर कधी पांढरे धोप कबुतर ! तर कधी टेबलावर झोपलेल्या माणसाच्या शरीरारचे तीन तुकडे करणे, ते परत जोडणे, असे नाना खेळ करून तो जादूगार लोकांचे मनोरंजन करत असतो. मला असं वाटतं की “जादू” या शब्दातच एक प्रकारची अशी “जादू” आहे जी सानथोरांना तो खेळ बघताना, अक्षरशः देहभान विसरायला लावून खिळवून ठेवते. एवढच नाही, तर ज्या व्यक्तीला जादूगाराने एखाद्या खेळात आपल्या इंद्रजालाने वश केले आहे, त्या व्यक्तीला तर ती इतकी कह्यात ठेवते, की त्या जादूगाराने “आज्ञा” करताच, ती व्यक्ती सफरचंद समजून, कच्चा बटाटा पण साऱ्या प्रेक्षकांसमोर मिटक्या मारीत आनंदाने खाते, हे आपण सुद्धा कधीतरी बघितलं असेल !

या दुनियेत जादूचा उगम कधी झाला, जगात पाहिली जादू कोणी, कोणाला आणि कोठे दाखवली असे साधे सोपे प्रश्न घेवून, त्या प्रश्नांची मी उत्तर देईन अशी अपेक्षा हा लेख वाचतांना कोणा वाचकाने कृपया ठेवू नये. कारण त्याची उत्तर द्यायला सध्याच्या विज्ञानयुगातला जागतिक कीर्तीचा “गुगल” नामक विश्व विख्यात जादूगार आपल्या खिशातच तर आहे मंडळी ! पण हां, माझ्या आयुष्यात मी पाहिलेल्या पाहिल्या दोन जादू कोणत्या या प्रश्नाचं उत्तर मात्र मी तुम्हांला नक्कीच सांगू शकतो. किंबहुना मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलेल्या दोन जादू, आपल्या पैकी माझ्या पिढीतील लोकांनी पाहिलेल्या त्यांच्या आयुष्यातल्या सुद्धा त्यांनी पाहिलेल्या पहिल्या दोन जादू असू शकतात, (आधीच वाक्य वाचून तुम्हांला थोडं गोंधळायला झालं असेल, तर बहुतेक तो माझ्या लिखाणावर झालेला आजच्या विषयाचा परिणाम असू शकतो) यावर माझा ठाम विश्वास आहे !

मंडळी, त्यातील पाहिली जादू म्हणजे, आपल्या दादाने किंवा ताईने मुठीत राहणारी लहान वस्तू उजव्या हाताने दूर फेकल्याचा अभिनय करून, ती वस्तू आपण सांगताच आपल्याला लगेच दाखवणे आणि दुसरी जादू म्हणजे डाव्या हाताचा अंगठा उजव्या हाताने कापणे ! काय, बरोबर नां मंडळी ?

लहानपणी डेव्हिड कॉपरफिल्ड नामक एका विदेशी जादूगाराचे एका पेक्षा एक विलक्षण जादूच्या प्रयोगाचे विडिओ बघून डोळे आणि डोकं अक्षरशः गरगरायला लागायचं! त्याच पाण्यावर चालणं काय, हवेत उडणं काय किंवा नायगाऱ्याच्या प्रचंड धबधब्यात पिंपात बसून उडी मारून परत काठावर प्रकट होणं काय ! बापरे, ते त्याचे सारे जादूचे खेळ आज नुसते आठवले तरी अंगावर काटा येतो मंडळी !

आपल्या देशातसुद्धा तसे अनेक छोटे मोठे जादूगार होऊन गेले, पण डेव्हिडशी तुलना करायची झाल्यास, पी सी सरकार, सिनियर आणि पी सी सरकार, ज्युनियर ही कलकत्याच्या पिता पुत्रांची नांव या संदर्भात प्रकर्षाने लगेच आठवतात.

माझे जन्मापासूनचे आजतागायतचे आयुष्य शहरात गेल्यामुळे, “काळी जादू” किंवा “चेटुक” या विषयात एखाद्या “गाववाल्याचे” जेवढे “ज्ञान” (का अज्ञान ?) आहे, त्याच्या ते 0. 001% सुद्धा नाही. त्यामुळे या विषयावर मी काही बोलणे अथवा लिहिणे, हा या विषयात स्वतःला तज्ञ समजणाऱ्या एखाद्या “गाववाल्याचा” अपमान होऊ शकतो. म्हणून उगाच त्या तथाकथीत जादूच्या उप शाखेला कोणत्याही तऱ्हेनं स्पर्श नं केलेलाच बरा. शिवाय माझा हा लेख अशा एखाद्या तज्ञ गाववाल्याने “चुकून” वाचलाच, तर त्याला आलेल्या रागापोटी तो माझ्यावर एखादं “लिंबू” फिरवायचा ! उगाच नको ती रिस्क आता या वयात कशाला घ्या ?

मंडळी, शेवटी एकच सांगतो, माझा सुद्धा जादूवर विश्वास आहे. पण ती जादू करणारा सर्वशक्तिमान जादूगार हा वर बसलेला आहे, असं माझं मत आहे ! आपल्या आयुष्यात वेळोवेळी निरनिराळे खेळ करून “तो” आपल्याला दाखवत असतो ! त्यातील त्याच्या कुठल्या खेळाला आपण टाळी वाजवायची, कुठला खेळ दाखवल्या बद्दल त्याचे मनापासून आभार मानायचे किंवा कुठल्या खेळातून काय बोध घेवून पुढे जायचं, हे ज्याचं त्यानं ठरवायचे !

तर अशा त्या सर्व शक्तिमान जादूगाराने आपल्याला दाखवलेल्या नानाविध खेळांचे वेळोवेळी अन्वयार्थ लावायची शक्ती, तो जादूगारच आपल्या सगळ्यांना देवो हीच सदिच्छा !

शुभं भवतु !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गीता जशी समजली तशी… भाग – १ ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

स्वपरिचय  

शिक्षण- M Sc. (Mathematics)

कार्यक्षेत्र – गृहिणी

परिचय – संत साहित्य-भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, गाथा, आत्माराम, अमृतानुभव, एकनाथी भागवत इ. अभ्यास सुरू आहे. त्यासंबंधी लिखाण  सुरू आहे. स्त्री संतांविषयी लिहिले आहे. काही कविता व ललित लेख लिहिले आहेत.

☆ गीता आणि मोह ☆ सौ शालिनी जोशी ☆

मोह ही एक मानसिक अवस्था आहे. ते एक आवरण आहे. ज्यामुळे खऱ्या ज्ञानाला माणूस दुरावतो. हा मोह माणसाच्या विकासाच्या आड येतो. त्याचा परिणाम माणसाच्या ज्ञान, विचार आणि आचरणावर होतो. सारासार विवेक दूर होतो. मन भ्रमित होते. योग्य-अयोग्य कळत नाही.

हा मोह तीन प्रकारच्या असू शकतो. १) वस्तूचा २) सत्ता संपत्तीचा किंवा ३) व्यक्तीचा. कारणे कोणतीही असली तरी माणूस कर्तव्यमूठ होतो. आणि परिणाम त्याला स्वतःला व इतरांनाही त्रासदायक होतो. गीतेचा जन्म ही मोहातूनच झाला आहे. मोह निवारण हा गीतेचा हेतू आहे. ते गुरुच करू शकतो.

धृतराष्ट्राला झालेला पुत्र मोह. जो गीतेच्या पहिल्या श्लोकातूनच व्यक्त होतो. ‘मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय।’ माझी मुले आणि पांडूची मुले काय करीत आहेत? माझी मुले आणि पांडव असा भेद त्याच्या ठिकाणी स्पष्ट दिसतो. बाह्यदृष्टीने अंध असणारा धृतराष्ट्र पुत्र प्रेमामुळे अंतःचक्षुनेही अंध झाला आहे. सारासार विचार विसरला आहे. योग्यता नसतानाही आपल्या पुत्राला राज्य मिळावे अशी त्याची इच्छा आहे. या पुत्रमोहाने आपल्या पुत्रांच्या यशासाठी कोणताही भलाबुरा मार्ग आचारण्याला त्याची ना नव्हती. म्हणून पांडवाना त्यांचे हक्काचे राज्य न देण्याच्या निर्णयाला त्यांनी विरोध केला नाही. पण हा पुत्र मोहच पुढे कौरवांच्या नाशाला कारण झाला.

दुर्योधनाला झालेला सत्तेचा मोह. सत्तेसाठी दुर्योधन कायमच पांडवाना पाण्यात पाहत आला. त्याच्या या अहंकाराचे पोषण शकुनी मामा कडून कायमच झाले. पांडवाना वनवास, विजनवास, द्रौपदी वस्त्रहरण अशी संकटांची मालिकाच भोगावी लागली. सत्तेच्या मोहापायी पांडवांना त्यांच्या वाट्याचे राज्य द्यायला दुर्योधनाने नकार दिला. उलट ‘सुईच्या अग्रावर राहील एवढीही जमीन देणार नाही’ असे उर्मटपणे सांगितले. विदूर व श्रीकृष्ण यांच्या सांगण्याचा उपयोग झाला नाही. धर्माधर्माचा त्याला विसर पडला होता. ‘जानामि धर्मं न मे प्रवृत्तिः। जानामि अधर्मं न मे निवृत्तिः।’ असे तो कबूल करतो. असा हा मोहाचा परिणाम माणसाला विचारहीन बनवितो. आपलेच करणे बरोबर असेच त्याला वाटते. कोणाचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत माणूस नसतो. दुर्योधनाचा मोह हा अहंकारातून, सत्तालालसेतून, पांडवांच्या द्वेषातून निर्माण झाला होता. म्हणून आपले हक्काचे राज्य मिळवण्यासाठी पांडवाना कौरवांबरोबर युद्ध करावे लागले. ते धर्मयुद्ध होते. अधर्माविरुद्धचे होते.

महापराक्रमी अर्जुन सुद्धा मोहात अडकला. ‘सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेsअच्युत’ असे भगवंतांना सांगणारा अर्जुन समोर युद्धभूमीवर आप्तस्वकियांना व गुरुजनांना पाहून धर्मसंमुढ झाला. त्यांच्या विषयी करुणा निर्माण झाली. ‘ भ्रमतीव च मे मनः’ (१/३०) तो भ्रमित झाला. गांडीव गळून पडले. शरीराला कापरे भरले. क्षत्रिय धर्माचे आचरण कठीण झाले. या मोहाचे सामर्थ्य इतके जबरदस्त होते की, तो संन्यासाच्या गोष्टी करू लागला. स्वजनांना मारण्याचे पाप करण्यापेक्षा युद्ध न करण्याचा पळपुटेपणा त्याला योग्य वाटू लागला. युद्धाचा परिणाम कुलक्षयापर्यंत पोहोचला. ज्ञानेश्वर अर्जुनाच्या या स्वजनासक्तीचे वर्णन महामोह असे करतात. ‘तैसा तो धनुर्धर महामोहे। आकळीला। ।'(ज्ञा१/१९०) अर्जुनाचा पराक्रम, स्वधर्मनिष्ठा, कर्तव्यनिष्ठा सर्व स्वजन मोहाने झाकले गेले. उलट तो श्रीकृष्णाला आपण कसे योग्य आहोत ते ऐकवू लागला. शेवटी धर्मसंमूढ झालेल्या त्याने श्रीकृष्णाचे शिष्यत्व पत्करले. त्याला शरण गेला. ‘शिष्यस्तेsहं शाधि मां त्वां प्रपन्नम्।’ (गी२/७). मोह दूर करण्याचे काम गुरुच करू शकतो. तेव्हा कृष्णाने गीतोपदेश केला. उपदेश करताना ते म्हणतात,

यदा ते मोहकलिलं बुध्दिर्व्यतितरिष्यति।

सदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च।

(गी२/५२)

जेव्हा तुझी बुद्धी हे मोहरूपी मालीन्य पार करून जाईल तेव्हाच या सर्व विचारातून तू विरक्त होशील. म्हणून मोह दूर करणे हे गीतेचे प्रयोजन ठरते. सगळी गीता सांगून झाल्यावर अठराव्या अध्यायात भगवंत अर्जुनाला विचारतात, ‘अर्जुना, तुझा मोह गेला की नाही?’ यावर अर्जुनाचे उत्तर फार सुरेख आहे. 

नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा तत्प्रसादान्मयाच्युत।

स्थितोsस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव।।

(गी. १८/७३)

भगवंतांनी अर्जुनाचा मोह दूर केला. तो संशय मुक्त झाला. श्रीकृष्णाच्या बोलण्याप्रमाणे करायला तयार झाल्या. तशी कबुली त्याने दिली. मोहनिरसन हे गीतेचे फलित प्राप्त झाले. नातेवाईकांच्या विषयीच्या ममतेतून, करुणेतून अचानक निर्माण झालेल्या मोहाचे निरसन झाले. तो युद्धाला तयार झाला. अज्ञानाने नाही तर पूर्ण ज्ञान होऊन, स्वतःच्या इच्छेने. येथे कोणतीही बळजबरी नाही. अंधश्रद्धा नाही.

अर्जुनाला मोहाचे दुष्परिणाम सांगणारे पंधरा-वीस श्लोक तरी गीतेत आहेत. वेळोवेळी प्रसंगानुरुप ते सांगून अर्जुनाला मोह किती हानी कारक आहे आणि मोहातून बाहेर पडणे कसे श्रेयस्कर आहे हे भगवंतांनी अर्जुनाला पटवून दिले. आणि शेवटी अर्जुन जेव्हा युद्ध करायला तयार झाला तेव्हा भगवंतांची खात्री झाली की गीतोपदेशाचे सार्थक झाले.

अशाप्रकारे जग हे मोहाने बाधित झालेले आहे. रामायणात अगदी सीतेलाही कांचनमृगाचा मोह आवरला नाही. हा व्यक्तिगत पातळीवरचा आणि शुल्लक गोष्टीसाठी, तरीही तो तिला टाळता आला नाही. म्हणून राम रावण युद्ध झाले. तर अर्जुनाला स्वजनासक्ती रूप मोह झाला पण तो भगवंतांना टाळता आला. दूर करता आला. म्हणून महाभारताचे युद्ध झाले. दोन्हीत दुष्ट शक्तींचा पराभव आहे. पण दोघांच्या मुळाशी मोहच आहे.

 आपण तर सामान्य माणसं आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात स्पर्धा आहे, संघर्ष आहे, हेवेदावे मत्सर आहे. त्यातून अनेक मोहाचे प्रसंग येत असतात. त्यातूनच आपण आपल्याला सांभाळले पाहिजे. अर्जुनाला सावरणारा तो भगवंत आपल्याही हृदयात आहे याची जाण ठेवून त्याचे स्मरण करून विवेकाने अविवेकावर मात करावी. स्वतःचा तोल धळू देऊ नये. नेहमी सावध असावे. हेच अर्जुनाच्या उदाहरणांनी सर्व समाजाला भगवंतांना सांगायचे आहे. शेवटी आपण सारे अर्जुन आहोत.

मोहाविषयी सांगणारे गीतेतील श्लोक क्रमांक

२/६३, ४/३५, ५/२०, ६/३८, ७/१३, ७/२०, ७/२५, १५/५, १५/१९, १६/१६, १७/१३, १८/७, १८/२५, १४/२२……

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ राजधानी दिल्ली… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

राजधानी दिल्ली ☆ सौ कल्याणी केळकर बापट

आपला संपूर्ण भारत हा त्याच्या वैविध्यपू्ण वैशिष्ट्यांनी समृध्द आहे. संपूर्ण भारतातील वेगवेगळा प्रांत हा त्याच्या निरनिराळ्या उपलब्धते मुळे प्रसिद्धीस पावलेला आहे. ह्यामध्ये त्या त्या प्रांताची वैशिष्ट्ये हा तो प्रांत किती समृद्ध आहे हे दर्शवून देतात. ह्यामध्ये त्या भागाला लाभलेले नैसर्गिक सौंदर्य, पोषक हवामान, खानपान आणि राहणीमानातील समृध्दी ह्यांचा समावेश असतो.

ह्या प्रांतापैकीच एक प्रांत बंगाल. बंगालचे नाव घेताच डोळ्यांसमोर उभा राहतो तेथील नवरात्र उत्सव, लाभलेला सागरकिनारा, त्यामुळे मत्स्यप्रेमी मंडळींचा तृप्त होणारा जठराग्नी, ओल्या नारळाच्या भरपूर वापरामुळे तेथील ललनांना लाभणार विपुल केशसंभार, माशांच्या सेवनाने लाभलेले सुंदर डोळे, आणि ह्याचा परिपाक म्हणजे मिष्टान्न प्रेमीची तृप्ती करणारा तो पाकात बुडलेला भलामोठा रसगुल्ला, बायकांचा विक पॉइंट असणाऱ्या कलकत्ता साड्या, आणि अजुन बरेच काहीतरी.

आता हे कलकत्ता वर्णन अजुन एका गोष्टीची आठवण करून देतं ती म्हणजे ब्रिटिश काळात भारताची राजधानी ही पण कलकत्ताच होती. आजच्या तारखेला म्हणजे 12 डिसेंबर 1911 साली भारताची राजधानी कलकत्ता ऐवजी दिल्ली करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. मात्र त्याची कागदोपत्री अंमलबजवणी नंतर झाली.

भारताची राजधानी असलेल्या नवी दिल्लीचा पाया तत्कालीन सम्राट जॉर्ज पाचवा यांच्या द्वारे रचण्यात आला. दिल्लीला भारताची राजधानी करण्याचा प्रस्ताव 1911 च्या दिल्ली दरबार कार्यक्रमात ठेवण्यात आला होता. शहराची वास्तुकला आणि नियोजन दोन ब्रिटिश आर्किटेक्ट सर हर्बर्ट बेकर आणि सर एडविन लुटियन यांच्याद्वारे बनविण्यात आली आहे. 13 फेब्रुवारी 1931 रोजी व्हाईसरॉय लॉर्ड इर्विन यांनी दिल्लीचे देशाची राजधानी म्हणून उद्घाटन केले. तेव्हापासून नवी दिल्ली सरकारचे केंद्र बनली आणि देश चालविण्यासाठी आवश्यक सर्व शाखा दिल्लीमध्ये आहेत.

भारताची राजधानी दिल्ली होण्यापूर्वी 1911 पर्यंत कोलकत्ता ही देशाची राजधानी होती. तसेच दिल्ली यापूर्वी भारतावर राज्य केलेल्या अनेक साम्राज्यांचे आर्थिक आणि राजकीय केंद्र होते. यापैकी काही उत्तम उदाहरणे म्हणजे दिल्ली सल्तनत मधील मुघलांच्या कारकीर्दीची. ब्रिटिश भारतात आल्यानंतर बर्‍याच गोष्टी बदलल्या. 1900 च्या सुरुवातीच्या काळात ब्रिटीश प्रशासनाने भारतीय साम्राज्याची राजधानी कलकत्ताहून दिल्लीला हलविण्याचा विचार केला.

राजधानी हलवण्यामागील मुख्य कारण म्हणजे दिल्लीचे स्थान. कोलकत्ता हे देशाच्या पूर्वेकडील किनारपट्टी भागात होते, तर दिल्ली उत्तरेकडील भागात होती. ब्रिटीश सरकारच्या म्हणण्यानुसार, दिल्लीहून राज्य करणे सोपे आणि सोयीचे होते.

हा प्रस्ताव ब्रिटीश राजांनी मान्य केला आणि त्यानंतर 12 डिसेंबर 1911 रोजी दिल्ली दरबार दरम्यान तत्कालीन शासक जॉर्ज पंचम यांनी क्वीन मेरी बरोबर जाहीर केले की कोलकाता येथून भारताची राजधानी दिल्लीत हलविण्यात येईल. या घोषणेबरोबरच किंग्जवे कॅम्पच्या कोरोनेशन पार्कचे शिलान्यासही करण्यात आले. ते व्हायसरॉय यांचे निवासस्थान होते.

15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत सरकारने राजधानी म्हणून दुसऱ्या शहराचा विचारही केला नाही. कारण, तोपर्यंत नवी दिल्लीचा विस्तार अनेक पटीने झाला होता वेगाने विकास होत होता. स्वातंत्र्यानंतर, दिल्ली नवीन राष्ट्राची राजधानी बनली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तीचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आणि दिल्ली आता देशाची राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक राजधानी बनली आहे.

तसही भारताची राजधानी कलकत्त्या हून दिल्ली ला हलविण्यामागे अजुन एक प्रमुख कारण म्हणजे बंगालच्या फाळणी नंतर कलकत्त्यातील राजकीय, सामाजिक वातावरण एकदम ढवळून निघाले होते, प्रचंड अस्थिरता आली होती.

चिरायू भारताच्या दृष्टीने राजधानी हलविण्याचा निर्णय एकदम मोलाचा ठरला ह्यात तिळमात्रही शंका नाही.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ३६ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ३६ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- दुसऱ्या दिवशी तिन्हीसांजेला जेव्हा न रडता बाळ छान खेळत राहिलं तेव्हा मात्र सगळ्यांच्या डोक्यावरचं ओझं आपसूकच हलकं झालं. बाबा गेले असले तरी या ना त्या रूपात ते आपल्याजवळच आहेत असा दिलासा देणारी ही घटना जेव्हा पुढे गप्पांच्या ओघात मला समजली तेव्हा ते ऐकून माझ्या मनात त्याबद्दल कणभरही साशंकता निर्माण झालेली नव्हती. पण या घटनेला परस्पर छेद देणारी अशीच एक घटना जेव्हा पुढे माझ्या संसारात घडली तेव्हा मात्र…. ?)

माझ्या संसारात घडलेल्या त्या घटनेने निर्माण झालेल्या जीवघेण्या दु:खाशी कधीकाळी माझ्या आयुष्यात येऊन गेलेल्या व्यक्तींचे धागेदोरे जुळलेले असणे शक्य तरी आहे का? पण ते तसे होते. त्याचा थांग मात्र आज चाळीस वर्षे उलटून गेल्यानंतरही मला लागलेला नाही. ते सगळेच अनुभव इतक्या वर्षांनंतर आजही नुकतेच घडून गेलेले असावेत तसे मला लख्ख आठवतायत!

वर उल्लेख केलेल्या खूप वर्षांपूर्वी आमच्या संपर्कात येऊन गेलेल्या त्या व्यक्ती म्हणजे आमचे किर्लोस्करवाडीचे माझ्या बालपणातले शेजारी. बाबांच्या बदलीनंतर आम्ही कुरुंदवाडहून किर्लोस्करवाडीला रहायला आलो तेव्हा कॉलनीतल्या आमच्या शेजारी रहात असलेले ते पाटील कुटुंबीय. त्यांचा शेजार हा माझ्या आयुष्यातला खरंच अतिशय आनंदाचा काळ होता!

किर्लोस्करवाडीला आमचं जाणं म्हणजे आमच्यासाठी वाडासंस्कृतीतून एका आखीव-रेखीव, चित्रासारख्या सुंदर अशा काॅलनीत रहायला जाणे होते. तिथे शेजार कसा असेल याबद्दल दडपणमिश्रित उत्सुकता आईच्या मनात होती आणि ‘आपल्याबरोबर खेळायला तेथे मित्र असतील ना?’ ही अनिश्चितता आम्हा भावंडांच्या. बहिणींनी बोलून दाखवलं नाही तरी मैत्रिणी कशा मिळतील याची उत्सुकता त्यांच्याही मनात असणारच. आमच्या सर्वांच्या या अपेक्षा एकहाती पूर्ण केल्या आमच्या शेजारी रहाणाऱ्या पाटील कुटुंबाने!

बाबा आधीच चार दिवस कि. वाडीला पोस्टात हजर झाले होते. आई बांधाबांध करुन आम्हा भावंडांना घेऊन आलेली. बाबा स्टेशनवर उतरून घ्यायला आले तेव्हा याच सगळ्या भावना मनात गर्दी करीत होत्या. आम्ही तिथे स्टेशनबाहेर आलो तेव्हा बाबांनी आधीच ठरवून ठेवलेला टांगा आमच्या स्वागताला सज्ज होता. टांग्यात प्रथमच बसायला मिळणार असल्याने आम्ही सर्व भावंडे हरखून गेलो.

“ते बघ. बाळाला घेऊन त्या मुली दारात बसल्यात ना त्याच्या शेजारचंच आमचं घर. तिथं थांबव. ” बाबा टांगेवाल्याला म्हणाले.

‘त्या दोन मुली म्हणजे शेजारच्या पाटील कुटुंबातल्या लिला आणि बेबी या दोन बहिणी. जेमतेम १७-१८च्या आसपास वय असलेल्या त्या दोघी पुरता महिनाही न झालेल्या एका लहान बाळाला वाटीत दूध घेऊन ते कापसाच्या बोळ्यानं एकेक थेंब पाजवत बसलेल्या. ते विचित्र दृश्य पाहून आईचा जीव कळवळला. प्रवासातून दमून आलेली असूनही घरात न जाता आई पहिल्या पायरीवरच थबकली.

“एवढ्या लहान बाळाला असं बाहेर दूध पाजवत कां बसलायत ? गार वारं नाही कां गं लागणार त्याला? उठा बरं. त्याला आत न्या. आणि तुम्ही का करताय हे सगळं? बाळाची आई कुठे आहे?” आई म्हणाली.

त्या दोघी एकदम गंभीर झाल्या. मग कसनुसं हसल्या.

“आईला घटप्रभेच्या दवाखान्यात बाळंतपणासाठी नेलंय. तिला खूप बरं नाहीये. म्हणून या इवल्याशा चिमणीला इथे घेऊन आलोय. बाळाला आईजवळ ठेवू नका असं डॉक्टरांनी सांगितलंय. मग काय करायचं? आईला अजून पंधरा दिवसांनी सोडणारायत. “

त्या दोघींमधल्या मोठ्या बहिणीने, लिलाताईने तिच्या वयाला न शोभेल अशा पोक्तपणे सांगितलं. ते ऐकून आई कळवळली.

“तुम्ही सगळे आज येणाराय असं काकांनी सांगितलं होतं. आम्ही दोघी वाटच पहात होतो. बरं झालं आलात. महिनाभर होऊन गेला शेजारचं घर रिकामं झाल्याला. आम्हाला करमतच नव्हतं. ” लिलाताई मनापासून म्हणाली आणि बाळाला घेऊन उठली.

“वहिनी, तुम्ही हातपाय धुवून घ्या. मी चहा करून आणते तुम्हा सगळ्यांचा”

“छे.. छे. मुळीच नाही हं. यांना अजिबात आवडायचं नाही. मला तर नाहीच नाही. तुम्ही या पिल्लाला घेऊन आत जा बरं आधी. काळजी घ्या त्याची. कांही लागलं सवरलं तर कधीही हाक मारा मला. संकोच नका करू. “आई म्हणाली.

त्या पाटील कुटुंबियांंचा औपचारिक परिचय होण्यापूर्वीच अशी आपुलकीची देवाण-घेवाण झाली आणि त्यामुळेच नवीन बि-हाडी आमचा गृहप्रवेश होण्यापूर्वीच दोन्ही कुटुंबात आपुलकीचं, माणुसकीचं नातं अलगद रुजलं गेलं तसंच नंतर अधिकच घट्ट होत गेलं!

ही १९५९ सालातली गोष्ट. सुरुवातीच्या भागांमधे उल्लेख आलेत त्यानुसार बाबांच्या निवृत्तीनंतर माझ्या काॅलेज शिक्षणासाठीची सोय म्हणून आम्ही मिरजेला रहायला आलो ते १९६७ मधे. या आठ वर्षांच्या प्रदीर्घ काळांत येईल त्या परिस्थितीला तोंड देता देता बऱ्याच चढउतारांना सामोरे जात आमची दोन्ही कुटुंबे परस्परांशी मनाने जोडली गेली होती. आम्ही कि. वाडी सोडताच मात्र नंतरच्या काळात आमच्या भेटी आणि संपर्कही जवळजवळ राहिलाच नाही. याला अपवाद ठरली ती एकटी लिलाताई आणि त्यालाही निमित्त ठरली होती तिची दत्तमहाराजांवरील श्रध्दाच!योगायोग असा कीं तिच्या मनात ही श्रध्दा मूळ धरु लागली ती माझ्या बाबांना गाणगापूरला मिळालेल्या प्रसादपादुकांमुळे आणि त्या पादुकांच्या आमच्या अंगणातील लहानशा मंदिरामुळे!

या सगळ्याचाच मागोवा घेणं, माझ्या संसारात अचानक घडलेल्या ‘त्या’ दु:खद घटनेमागचा कार्यकारणभाव शोधण्यासाठी अपरिहार्य तर आहेच तसंच जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्म या अखंड चक्रामधल्या गूढ रहस्याची दारं थोडी कां होईना किलकिली होण्यासाठीही.. !

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ व्रतोपासना – ३. अन्नाचा स्वीकार ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

व्रतोपासना – ३. अन्नाचा स्वीकार ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

मला घरातील ज्येष्ठ मंडळी कायम स्मरणात असतात. त्यांची काही वाक्ये लहानपणी पासून ऐकतो. त्यावेळी फारसे कळायचे नाही. पण मोठ्यांना उलट प्रश्न विचारण्याचा तो काळ नव्हता. पण त्या मुळे मनावर चांगले संस्कार कोरले गेले. आणि त्यातील काही वाक्ये आत्ता लक्षात येतात आणि ती किती महत्वाची होती हे लक्षात येते. कोणत्याही पदार्थाला नकार दिला की एक वाक्य आजी कायम म्हणायची, कोणाचाही हात मोडू नये. हे ऐकून त्यावेळी आम्ही तोंडावर हात ठेवून हसत असू. मोठ्याने हसलो किंवा उलट बोलले तर मार मिळेल या भीतीने गुपचुप हसायचे. आणि हात कसा मोडतो? हा प्रश्न पडायचा. पण त्याचा अर्थ जसे वय वाढत गेले तसा लक्षात यायला लागला. आणि हे पूर्वीचे संस्कार फार महत्वाचे आहेत हेही जाणवते.

समोर आलेले अन्न आपण स्वीकारले नाही किंवा त्याला नकार दिला तर त्याचा आनादर होतो. आणि ज्या व्यक्तीने आपल्याला दिलेले असते त्या व्यक्तीचाही अपमान होतो. त्यामुळे आपल्याला न आवडणारा पदार्थ समोर आला तर त्याला कधीही नकार देऊ नये. त्याचा आदर करण्यासाठी त्यातील एखादा अल्पसा घास तरी ग्रहण करावा. मी कित्येकदा असा अनुभव घेतला आहे, की एखादा पदार्थ नाकारला तर दिवसभर काहीच खायला मिळत नाही. अगदी जवळ पैसे, स्वतःचा जेवणाचा डबा असेल तरी जेवणासाठी वेळ मिळत नाही.

अजून एक विचार असा आहे, ज्या अन्ना मुळे आपले भरण पोषण होते त्याच अन्नाने आपला अनादर केला तर? आपल्या शरीरात अन्नद्वेष निर्माण झाला तर? आपले जगणे पण अशक्य होऊन जाईल. म्हणून कोणतेही अन्न मना पासून स्वीकारावे. तरच ते चांगले पोषण करते. आपण अन्नाला व पाण्याला भावना देऊ शकतो. त्या भावना अन्न ग्रहण करते. अन्नाला सकारात्मक व चांगल्या भावना देण्यासाठी आपल्या कडे स्वयंपाक करताना पाळायचे काही नियम असतात.

त्यामुळे हे अन्नाचा स्वीकार हे व्रत म्हणून सर्वांनीच आचरणात आणावे. तेच संस्कार आपल्या मुलांवर होणार आहेत. सोपे पण महत्वाचे व्रत आहे ना? माझ्या मताशी सहमत आहात का? नक्की कळवावे.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

९/११/२०२४

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares