मराठी साहित्य – विविधा ☆ “दुपार चं गणित…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “दुपार चं गणित…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

काय राव… तुम्ही कमालच केली की… दुपारची झोप पार उडवली की… किती गोंधळ झाला सगळ्यांचा… नाही म्हटलं तरी काकासाहेब काही बोलले असतीलच नं… पण आता हे निस्तरणार कसं…

अहो मी कशाला निस्तरायचं… म्हणजे मी काही सगळ्यांना आणि  सगळं सोडलेलं नाही… आता मी नाही… असा समज काकांचा झाल्यावर सावरायचं कसं?… आणि मी पण आलोय याची जाणीव या दोघांना झाल्यावर आवरायचं कसं?… हा त्यांचा प्रश्न आहे. जे होईल ते त्यांनी निस्तरायचय आहे. मी नाही…. ते काय करतात हे बघायचं काम माझं…

पण आता जी आरडाओरड होईल त्याच काय?…

अरे आरडाओरड अगोदरही होती, आणि नंतरही होणार आहे. आरडाओरड सगळेच करतात. बऱ्याचदा तर संदर्भ सुध्दा तेच असतात. फक्त नांव बदलावी लागतात. अगोदर कौतुक केलं असेल तर आता करायचं नाही. आणि अगोदर कौतुक केलं नसेल तर आता करायला विसरायचं नाही. हे लक्षात घेतलं की संपलं. मी काही कमी आरडाओरड केली का?… चालायचंच.

अहो पण लोकं अगोदर तुमच्यासाठी फिरले, झटले त्याचं काय?….. असं काही जणं विचारतात. त्यांना काय सांगायचं?…

अरे मग मी काय वेगळं करतोय?… लोकं आमच्यासाठी झटतात, झगडतात पण आम्ही पण त्यांच्यासाठीच झगडतोय ना. विरोधात असलो तर चांगल्या कामासाठी झगडतो. आणि सत्तेत असलो तर चांगली कामं झगडल्याशिवाय होत नाहीत. अनेक अडथळे येतात, आणले जातात ते पार करावे लागतात. असंच सांगतो ना. मग फरक आहे कुठे?… झगडणं दोन्ही बाजूला आहेच की…

आणि तुमच्या झोपेचं ते काय कौतुक? आम्ही सकाळी सकाळी काही केलं तरी त्रास, दुपारी केलं तरीही त्रासच. आमच्या झोपेचा विचार करा की. यासाठी रात्र रात्र सुध्दा जागवाव्या लागतात याचा विचार करा जरा…

सारखं वेगवेगळ्या पद्धतीने गणित मांडावं लागतं. उत्तर थोडं कुठे चुकतंय असं वाटलं की परत नवीन पद्धत. बरं गणित मांडायचं पण आपणच आणि सोडवायचं पण आपणच… हे गणित बरोबर आहे का? असं कोणाला विचारावं हा सुद्धा काही वेळा प्रश्न असतो. कारण ज्याला विचारावं तोच यावरून स्वतः नवीन गणित मांडू शकतो. त्यामुळे समोरचा वेगळं गणित मांडणारा नसावा. हे पण बघावं लागतं. वाटतं तेवढं सोपं नसतं हे…

काकांच काय… “सगळ्या समस्यांवर रामबाण उपाय” हे त्यांनीच लिहिलेलं पुस्तक त्यांच्याकडे आहे. प्रश्न आहे तो दुसऱ्या दोघांचा. ते कोणतं पुस्तक वापरतात हे बघायचं…

दुसरे दोघं म्हणजे कोण?… अगोदरचे की आता नव्याने जवळ केलेले…

परत तेच… मला गणित घालू नका. मी सांगितलं ना की गणित मांडायचं पण आपण आणि सोडवायच सुध्दा आपणच… चला निघतो. पुढची काही गणितं मांडून सोडवायची आहेत.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आकाशाशी जडले नाते..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ आकाशाशी जडले नाते..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

शब्दाची अंगभूत वैशिष्ट्येच त्या शब्दाला अर्थपूर्ण बनवतात. घन हा अगदी छोटा, अल्पाक्षरी शब्द याचं अतिशय समर्पक उदाहरण म्हणता येईल.

या शब्दाच्या एका रुढ अशा आणि अनेक प्रतिभासंपन्न कवींनी रसिकमनांत अधिकच दृढ केलेल्या एका अर्थाने  तर या शब्दाचे थेट आकाशाशीच अतूट नाते निर्माण निर्माण केलेले आहे आणि याच शब्दाच्या दुसऱ्या अर्थाने हे नाते अधिकच घट्ट झालेले आहे. घन या शब्दाचे हे दोन्ही अर्थ परस्परवेगळे असूनही परस्परपूरकही ठरलेले आहेत हेच या शब्दाचं अंगभूत असं वेगळं वैशिष्ट्य आहे.

          घन म्हणजे मेघ आणि घन म्हणजे घट्ट.म्हणजेच अप्रवाही.या दुसऱ्या अर्थाचं अप्रवाहीपण हे पहिल्या अर्थाच्या मेघाचं,ढगाचंही अंगभूत वैशिष्ट्य असावं हा निव्वळ योगायोग असेल तर तोही किती अर्थपूर्ण आहे याचे नवल वाटते!

           मेघ हा या शब्दाचा रसिकमनांत रुजलेला काव्यमय अर्थ थेट माणसाच्या जगण्याशी,सुखदु:खाशी जोडलेला आहे हे खरेच.तथापी ‘घट्ट’ या दुसऱ्या अर्थाची व्याप्ती आणि घनताही घन या शब्दाचे मोल अधिकच वृध्दिंगत करते असे मला वाटते.गंभीर शब्दातील गांभीर्य अधिक गडद करायला ‘घनगंभीर’ या शब्दाला ‘घन’च सहाय्यभूत ठरतो.घनघोर हा शब्द  युध्दाचे विशेषण म्हणून येतो आणि युध्दाची भयावहता अधिकच वाढवतो, तर जंगलाची व्याप्ती आणि नेमकं चित्र उभं करायला घनदाट शब्दाला पर्यायच नसतो. झांजा, टाळ,चिपळ्या, टिपऱ्या…. यासारख्या अनेक वाद्यांना सामावून घेणारा ‘घनवाद्य’ हा शब्दही फारसा प्रचारात नसला तरी आवर्जून दखल घ्यावी असाच.घन या शब्दाच्या सहाय्याने आकाराला आलेल्या अशा इतरही अनेक अर्थपूर्ण शब्दांनीच शब्दाशब्दांमधील परस्परसंबंध अधिकच दृढ केलेले आहेत एवढे खरे!

           घन या शब्दांचे वर उल्लेख केलेले मेघ आणि घट्ट हे दोन्ही अर्थ या शब्दाला एक वेगळंच रुप बहाल करतात.घन हा एकच शब्द ‘मेघ’ या अर्थाने नाम तर दुसऱ्या अर्थाने विशेषणाचे भरजरी वस्र परिधान केलेला असा बहुगुणी शब्द बनतो!

          घन हा शब्द नाम आणि विशेषण म्हणूनच नाही तर प्रत्यय म्हणूनही वापरला जातो.प्रत्यय म्हणून येताना तर तो स्वतःचं अनोखं वैशिष्ट्यही अधोरेखित करतो.प्रत्ययरुपात एखाद्या शब्दाच्या आधी जागा पटकावून घननीळ,घनदाट,घनघोर,अशा विविध विशेषणांना जन्म देणारा हा, प्रत्यय रुपात एखाद्या शब्दानंतर येत जेव्हा त्या शब्दाशी एकरुप होतो, तेव्हा आकाराला आलेली ‘आशयघन’,’दयाघन’ यासारखी विशेषणे त्या शब्दांमधील मूळ नामांचे (आशय,दया इ.)अर्थ अधिकच सघन करतात.

          घन हा असा विविध वैशिष्ट्यांनी अर्थपूर्ण ठरणारा शब्द म्हणूनच मराठी भाषेच्या विस्तृत,व्यापक आकाशाशी दृढ नाते जडलेला एक चमचमता ताराच आहे असे मला वाटते.

©️ अरविंद लिमये,सांगली

(९८२३७३८२८८)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “संतोषचं नेमकं काय चुकलं…” ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? विविधा ?

☆ “संतोषचं नेमकं काय चुकलं…” ☆ श्री संदीप काळे ☆

पुण्यात माझ्या मित्राची, समीरची एक छोटी कंपनी आहे. परवा सकाळी मी समीरकडे जाऊन चहा घेत गप्पा मारत होतो, तेवढ्यात ऑफिसमध्ये काम करणारा मुलगा आला. तो समीरला सांगत होता, ‘‘आजही तो मुलगा परत आला आहे. तो म्हणतोय, मला काहीतरी काम द्या.’’

समीर हळू आवाजात म्हणाला, ‘‘त्या मुलाला प्यायला पाणी द्या, चहा पाजा आणि सांगा, जेव्हा आमच्याकडे काम असेल, तेव्हा तुला कळवू.’’

मी काचेमधून बघत होतो. एक पंचविशीमधला तरुण हाताने घाम पुसत होता. समीरला मी विचारलं, ‘‘कोण आहे हा मुलगा?’’

समीर म्हणाला, ‘‘सहा महिन्यांपासून नेहमी येतो आणि मला काम द्या, असं म्हणतो.’’

मी म्हणालो, ‘‘हल्ली बेरोजगारी खूप वाढली आहे. बिचारा शिक्षण नसल्यामुळे कदाचित असं म्हणत दारोदारी फिरत असेल.’’

समीर म्हणाला, ‘‘तसं नाहीये, तो उच्चशिक्षित आहे, तीन डिग्री आहेत त्याच्याकडे. गेल्या चार वर्षांपासून पुण्यामध्ये तो स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. आता त्याच्या सहनशीलतेचा अंत झालाय. स्पर्धा परीक्षांचा नाद त्याने सोडून दिलाय. दोन वेळच्या खायची व्यवस्था व्हावी, असं त्याला वाटतंय. म्हणून तो कामाच्या शोधात आहे.”

समीरने सांगितलेलं ऐकून मला फार वाईट वाटलं. मी फोन आल्याचं निमित्त करून तिथून बाहेर पडलो व पाणी पीत असलेल्या त्या मुलापाशी येऊन बसलो. त्याची विचारपूस केली, चौकशी केली. त्याच्याशी बोलण्यातून अनेक विषय पुढे आले. मी ज्या मुलाशी बोलत होतो त्याचं नाव संतोष जाधव.

संतोष हा वाशीमचा. डिग्री मिळवल्यावर मित्राच्या सोबतीने स्पर्धा परीक्षेसाठी पुण्यात आला. केवळ एवढ्यावरच थांबला नाही, तर आपल्या आसपास असणारी अनेक मुलं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुण्यात घेऊन आला. संतोषला एकच आवड होती, स्पर्धा परीक्षेतून मोठं नाव असणाऱ्या व्यक्तीचं मोटिव्हेशन असणारे व्हिडीओ पाहत बसायचं. त्या व्हिडीओच्या मोहातूनच आपणही लाल दिव्याच्या गाडीत बसावं, असं स्वप्न संतोषचं होतं.

एक बहीण होती, त्या बहिणीला घेऊन संतोषने आपलं पूर्ण बिऱ्हाड पुण्याला थाटलं. बहीणही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू लागली. एका वर्षानंतरच बहिणीने निर्णय घेतला की, आता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा नाही, कुठंतरी नोकरी करून आयुष्याला सुरुवात करायची.

एका खासगी शिकवणीमध्ये बहीण शिकवायला लागली. दोन वर्षांनंतर तिने संतोषच्या मित्रासोबतच लग्न केलं. तो मित्रही स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा; पण आता पुण्यातच एका किराणा दुकानामध्ये काम करतो.

समीरही बाहेर येऊन आमच्या गप्पांमध्ये सहभागी झाला. समीर संतोषला म्हणाला, ‘‘आज जरा गडबड आहे, तू उद्या ये आणि आपण सगळं ठरवून टाकू.’’ समीर त्याच्या कामाला लागला. मी माझ्या कामाच्या दिशेने निघालो. संतोषचा काळजीने व्यापलेला चेहरा माझ्या डोळ्यांसमोरून जात नव्हता.

माझ्या ड्रायव्हरने गाडी काढली. आम्ही रस्त्याने निघालो. थोडं पुढे गेलो. संतोष रस्त्याच्या कडेने जात होता. त्याच्या अंगावरला जर्जर झालेला शर्ट पाहून मला तो लगेचंच

ओळखता आला. मी त्याला आवाज दिला, ‘‘अरे, कुठं निघालास?’’

तो म्हणाला, ‘‘बुधवार पेठेमध्ये बहीण राहते, तिच्याकडे निघालो.’’

मी म्हणालो, ‘‘चल, मीही त्याच भागात चाललोय, तुला सोडतो.’’ गाडीमध्ये परत आमच्या गप्पा सुरू झाल्या. शनिवारवाड्याजवळची रहदारी एकदम कंटाळवाणी, तिथं आम्ही थोडा वेळ अडकलो. माझं ‘सकाळ’चं कार्यालय आलं.

संतोष खाली उतरून निघणार, इतक्यात मी त्याचा हात धरला आणि त्याला म्हणालो, ‘‘चल, आपण दोन घास काहीतरी खाऊ या.’’ आमच्या ‘सकाळ’च्या ऑफिसमधल्या कॅन्टीनमध्ये जेवताना आमच्या अजून गप्पा सुरू होत्या.

संतोष म्हणाला, ‘‘लहानपणी कळायला लागलं, तेव्हा आजारामध्ये आई गेली. आई दहा दिवस तापाने फणफणत होती; पण एक गोळी आणायला बापाकडे पैसे नव्हते. आई गेल्यावर आयुष्याचा बराचसा काळ माझ्या लहान बहिणीचा सांभाळ करण्यासाठी गेला. बाबा वारल्यावर गावाकडे जे जे होतं, ते वडिलांचं कर्ज फेडण्यात संपलं. गावाला अखेरचा रामराम ठोकला.’’

घरचा विषय काढता काढता आम्ही स्पर्धा परीक्षा या विषयावर येऊन थांबलो. स्पर्धा परीक्षेबाबत संतोषने मला जे काही सांगितलं, ते अतिशय धक्कादायक होतं.
मराठवाडा आणि विदर्भातून रोज कित्येक मुलं पुण्यात येतात आणि स्वतःच्या आयुष्याला साखळदंड घालून घेतात. स्पर्धा परीक्षांमध्ये तयारी करणाऱ्या त्या मुलांच्या समस्यांनी मोठा कळस गाठल्याचं मला पाहायला मिळालं.

मी आणि संतोष तिथल्या अनेक पेठांमध्ये गेलो. तिथं अनेक मुलांना भेटलो. प्रत्येक मुलाचं म्हणणं एकच होतं, ‘माझ्या हाताला काम मिळेल का? आता बस झालं, नको स्पर्धा परीक्षा.’

मी स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होईन, या विचारानं संतोषसारख्या हजारो जणांनी आपलं गाव सोडलं खरं; पण अधिकारी होणं सोडा, साधी गाडी पुसण्याचीही नोकरी द्यायला कोणी तयार नव्हतं.

संतोषचा मित्र सिद्धार्थ कांबळे, राजन गायकवाड, समीर धायगुडे या सगळ्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये अपयशी झालेली मुलं व्यसनाच्या आहारी कशी गेलेली आहेत, हे सांगितलं. किती मुलं वाममार्गाला लागलेली आहेत, याचे अनेक किस्से सांगितले.

आम्ही सगळे जण पेठेमधल्या संतोषच्या दहा बाय दहाच्या रूमवर बसलो होतो. ती रूम कसली, जनावराचा खुराडा जसा असतो ना, तसं होतं ते. त्या भिंतीमध्ये हात घातला, तर पलीकडे हात निघेल, अशा त्या घराच्या भिंती होत्या. एवढ्या छोट्या जागेत पाच जण कसं काय राहत असतील देवाला माहीत!

आमच्या आवाजाचा गलबला ऐकून खाली असलेला घराचा मालक वर आला. संतोषला म्हणाला, ‘‘दोन दिवसांत जर तू रूमचं भाडं दिलं नाहीस, तर तुझ्या शर्टला धरून बाहेर काढीन, तुझं सामान रस्त्यावर फेकून देईन.’’

संतोष बिचारा शांतपणे ते ऐकून घेत होता. संतोष मला म्हणाला, ‘‘गेल्या सहा महिन्यांपासून ताईने पैसे देणं बंद केलं. मला पैसे देण्यावरून तिचं आणि तिच्या नवऱ्याचं भांडण व्हायचं. हे मला जेव्हा कळालं, तेव्हा मी तिच्याकडे पैसे मागणं, तिच्याकडे फारसं जाणं सोडून दिलं.’’

मी म्हणालो, ‘‘अरे पण रोजचे खर्च भागवायचे कसे?’’

संतोष म्हणाला, ‘‘काही नाही, आता मी आणि माझे हे दोन मित्र सकाळी दोन-तीन सोसायट्यांमध्ये जाऊन लोकांच्या गाड्या धुतो. त्यातून जे पैसे मिळतात, त्या पैशांमध्ये आता एक-एक दिवस काढतोय.’’

संतोषच्या नजरेतून मी जेव्हा स्पर्धा परीक्षेचा सुरू असलेला बाजार पाहिला, तेव्हा मी आश्चर्यचकित झालो. किती भयानक ते चित्र होतं.

अनेक मुलांना भेटत असताना नांदेडचे प्रोफेसर समीर जाधव भेटले. जाधव आता सेवानिवृत्तीनंतर पूर्णवेळ एका क्लासेसमध्ये शिकवणीचं काम करतात. मी त्यांना म्हणालो,

‘‘हा बाजार दिवसेंदिवस अजून वाढतोय, गंभीर होतोय, त्याला जबाबदार कोण आहे?’’

जाधव म्हणाले, ‘‘पालक आणि विद्यार्थी दोघेही आहेत.’’

मी म्हणालो, ‘‘कसं काय?’’

ते म्हणाले, ‘‘पालकांनी त्यांच्या फारशी समज नसणाऱ्या मुलांना समजावून सांगायला पाहिजे. जर विद्यार्थ्याला सुरुवातीपासून ६० आणि ७० टक्केच्या आतमध्ये मार्क असतील, तर त्याने स्पर्धा परीक्षांकडे न गेलेलं बरं. पालकही मुलांना स्पर्धा परीक्षेचा आग्रह धरतात. तुम्हाला सेवाच करायची, तुम्हाला कामच करायचं, तर कुठलंही काम आनंदाने करा ना! सन्मानाने जगण्यासाठी पैसा लागतो किती? जिथं तुमचं कधीही समाधान होत नाही, तिथं जायचा विचार का करायचा?’’

जाधव सर जे बोलत होते, ते अगदी खरं होतं. जाधव सर म्हणाले, ‘‘संतोषचं आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या त्या हजारो मुलांचं काम सगळीकडे शेतात एकच पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसारखं झालं आहे. पीक येतच नाही. आलं तरी सगळीकडे एकच पीक असल्यामुळे कवडीचा भाव असतो. मुलांना आणि त्यांच्या पालकांना हे पटलं तर नवलच.”

पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेत अपयशी ठरलेल्या मुली वाममार्गाला कशा लागतात, याची अनेक उदाहरणं संतोष आणि त्यांचे मित्र मला देत होते. ते सगळं ऐकून माझ्या अंगावर काटा येत होता. संतोषचा मित्र सिद्धार्थ याला मी म्हणालो, ‘‘ज्या दिवशी तुमच्याकडे पैसे नसतात, त्या दिवशी तुम्ही जेवण कसं करता?’’

सिद्धार्थ म्हणाला, ‘‘पुण्यामध्ये काही ठरलेली ठिकाणं आहेत, तिथं अनेक मुलं जेवण्यासाठी जात असतात. अनेक मंदिरांच्या समोर प्रसाद म्हणून अन्नदान होतं, तिथं आम्ही जातो. पोटाची भूक इतकी भयंकर आहे की, लाज नावाचा प्रकार काही केल्या शिल्लकच राहत नाही. गावाकडे काम करायला मन तयार होईना.”

संतोषचं काय चुकलं आणि संतोषसारख्या हजारो मुलांचं रोज काय चुकतंय, याकडे आता सगळ्यांनीच डोळसपणे पाहण्याची वेळ आली होती. अवघ्या राज्यातली तरुणाई पुण्यात येत आहे. पुण्यामध्ये या सगळ्यांच्या स्वप्नांना सोनेरी झालर मिळते, असं अजिबात नाही. किंबहुना नव्वद टक्केपेक्षा अधिक जणांच्या वाट्याला अपयश येतं. हे अपयश का येतं, याचा शोध जर वेळीच घेतला नाही, तर मोठा अनर्थ घडणार आहे, हे मात्र नक्की..!

(आजचा हा लघुलेख स्वतः लेखक श्री. संदीप काळे, संपादक, मुंबई सकाळ, यांच्या सौजन्याने.)

© श्री संदीप काळे

९८९००९८८६८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “इतकं पण धावू नका…” ☆ डाॅ.धनंजय देशपांडे ☆

? विविधा ?

☆ “इतकं पण धावू नका…” ☆ डाॅ.धनंजय देशपांडे ☆

इतकं पण धावू नका…

आणि अकालीच वरती जाऊ नका !

अनेकदा आपण आपल्या कामाला झोकून देऊन इतका वेळ देत असतो की, आपल्याजवळ ‘आपल्यासाठीच’ वेळ उरत नाही. आणि मग एक दिवस असा येतो की, धाव धाव धावून आपण जे काही कमवलं, बँक बॅलन्स, फ्लॅट, गाडी…. ऐश्वर्य.. जे जे काही कमवलं ते पाहण्यासाठी, त्याचा आनंद घेण्यासाठी आपणच जिवंत नसतो.

मित्रानो…. ही कहाणी आहे जामनगर (गुजरात) च्या अत्यंत यशस्वी अशा डॉक्टरची अचानक थांबलेली जीवनयात्रा !

आजवर १६ हजार हृदयविकार रुग्णांवर उपचार करून त्यांना जीवनदान मिळवून दिले होते असे हे डॉ. गौरव गांधी स्वतः प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट (हृदयविकार तज्ज्ञ) होते. इतकंच नव्हे तर कमी वयात हल्ली अटॅक येत आहेत हे पाहून त्यांनी स्वतः एक मिशन सुरु करून त्याद्वारे सर्वाना जागे करत होते.

इतक्या लहान वयात १६ हजार ऑपरेशन्स त्यांनी केले म्हणजे ते रोज सुमारे सतरा ते अठरा तास काम करत असणार. तेही हृदयाचे ऑपरेशन्स म्हणजे अत्यंत नाजूक व तितकंच स्ट्रेसफुल्ल काम !

असेच एके दिवशी ते दवाखान्यात जायला निघाले अन रस्त्यातच त्यांना छातीत कळ आली आणि दवाखाण्यात पोहचेपर्यंत सगळं संपलं होतं. हजारोंचे जीव वाचवणाऱ्याचा जीव मात्र कुणालाच वाचवता आला नाही, इतका त्यांना आलेला तो अटॅक तीव्र होता.

दोन तीन कारणांसाठी मनात हळहळ दाटून येते. एक तर ४१ हे काही जायचे वयच नाही, आणि त्यातही अशा बुद्धिमान डॉक्टरचे, ज्याची समाजाला प्रचंड गरज होती. शिवाय इतरांनी गाफील राहू नये म्हणून जागे करणारे डॉ गांधी स्वतःच कसे स्वतःबद्दल गाफील राहिले ?

मला एकदम आपल्या डॉ. नितु मांडके यांची आठवण आली. तेही असेच झोकून देऊन काम करणारे हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टर ! ते तर म्हणायचे की, “मला आजारी पडायला देखील वेळ नाही, इतकी ऑपरेशन्स पेंडिंग आहेत. वेटिंग लिस्ट मोठी आहे”

मात्र तेच अटॅकने तडकाफडकी गेले !

कामाचा प्रचंड ताण आणि त्यातून होणारा मानसिक ताण, आणि त्यातून मग ओघानेच येणारा अटॅक !!

खूप वाईट वाटतं अशावेळी !

अर्थात एकेकाळी ऐन चाळीशीतच असताना मलाही अटॅक आलेला. पूना हॉस्पिटल मध्ये आयसीयू मध्ये मी ऍडमिट ! मात्र डॉ. जगदीश हिरेमठ सारखा देवदूत तिथं मला लाभला अन त्यांनी मला त्या आजारातून बाहेर तर काढलेच पण त्यांनी कान टोचून जे काही सांगितलं ते मी आजवर पाळलं, त्यामुळे थेट ट्रेकिंग करू शकतोय, गडकिल्ले चढून जातोय ! नाहीतर ”चार जिने सुद्धा यापुढं चढता येणार नाहीत’ असं त्यांनी सांगितलं होतं.

थोडक्यात सांगतो, ‘वेळेत जेवण, पुरेसा आहार आणि नो जागरण’ हि त्रिसूत्री त्यांनी दिलेली. जी आजवर काटेकोर पाळतोय. कितीही अर्जंट काम असलं तरी जेवणाची वेळ कधीच चुकवत नाही, आणि झोपेचीही ! झोपताना कपभर गार दूध, सकाळी अर्धा तास चालणे, अर्धा तास योगासने किंवा व्यायाम, बास ! इतकंच पुरते !!

मनात आलं की सरळ गाडी काढून गोवा, महाबळेश्वर फिरून येतो. मनाला मस्त ठेवलं की जिंदगी पण मस्तमौला होते. चार लोक काय म्हणतील याला फाट्यावर मारा. ते मनावर घेत बसून ताण घेतला तर तुम्ही फोटोत जाऊन बसाल आणि तेच ‘चार’ लोक तुमच्या फोटोला हार घालायला येतील. त्यामुळे फोटोत जायचं नसेल तर ताण घेणे सोडा.

डॉ. डी डी क्लास : मंडळी… स्वतःला कामात इतकं पण झोकून देऊ नका, की तुम्ही कोणत्याच कामाचे राहणार नाही. किंवा मग ‘राहणारच’ नाही. स्वतःच स्वतःवर इतका अन्याय करू नका. स्वतः स्वतःला थोडासा वेळ जरूर द्या. स्वतःची काळजी घ्या ! तुम्ही फक्त तुमचे नाहीत तर समाजाचे देखील आहात. त्यांना असं वाऱ्यावर सोडून देऊन कसे चालेल ?

बिझिनेसमध्ये अप डाऊन सुरु आहे ? असू द्या. काही फरक पडत नाही. जगलो तर पुन्हा लढून जिंकू शकतो !

नोकरीच्या जागी…. बॉसिंगचा त्रास आहे ? काही फरक पडत नाही. जगलो तर पुन्हा लढून जिंकू शकतो !  

घरात नातेवाईकांत वादविवाद, भांडण सुरु आहे ? काही फरक पडत नाही. जगलो तर पुन्हा लढून जिंकू शकतो !

विचार करा मंडळी…. वेळ अजून गेलेली नाही. सावध व्हा. काम तर केलंच पाहिजे, पण त्यात ताण निर्माण होऊ देऊ नका. कुत्रा मागे लागल्यासारखे धावू नका. शांतपणे पण दमदारपणे वाटचाल करा. मग अटॅक येणार नाही. हे नक्की ! त्यासाठी शुभेच्छा !

© डाॅ. धनंजय देशपांडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “नावात काय आहे?…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “नावात काय आहे?…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

हे वाक्य कोणाचं या बद्दल मी बोलणार नाही. पण आपल्याकडे नावातच सगळं काही आहे. मग त्या नावाचा संबंध कुठेही आणि कसाही असो. अगदी व्यक्ती, वस्तू, प्राणी, अन्न काहीही.

घरात मुल जन्माला आलं की पहिला आणि त्यातल्यात्यात मोठा सोहळा हा नांव ठेवण्याचाच असतो. मग नंतर भलेही घरातले लाडाने त्याला सोन्या, बाळा, छोट्या म्हणत असतील. किंवा वयस्कर त्याला तु रमेशचा का? तु प्रकाशचा का? असं विचारात असतील. पण नंतर तुझं नांव काय? असंच विचारतात.

पीटरसन, सॅमसन असं वडीलांच्या नावावरुनच मुलांचं नांव ठेवण्याची रीत काही ठिकाणी असेल. आपल्याकडे मात्र तसं नाही.

नांव ठेवण्याबद्दल आपला हात आणि काही वेळा तोंड कोणी धरणार नाही. आपल्याकडे मुलांच नांव ठेवण्याचा कार्यक्रम होतोच. पण काही कार्यक्रमांना नांवं ठेवायला सुद्धा आपण मागे नसतो. भलेही मागून म्हणजे कार्यक्रम झाल्यावर नावं ठेवत असलो तरी नांवं ठेवतांना मात्र मागे नसतो‌.

लग्नात सुध्दा नवरीमुलीचे नांव बदलण्याची पद्धत काही प्रमाणात आहे. यावेळी नांव काय ठेवलं हे कौतुकाने विचारतातच, पण ते घेण्याचा आग्रह देखील होतो. नांव ठेऊन नांव घेण्याची, किंवा नांव घेउन नावं ठेवण्याची सुरुवात इथूनच होत असावी. ठिक आहे आपल्याला आत्ता त्याबद्दल नांव ठेवायचं नाही.

मुलांचीच काय…… आपल्या कडच्या पाळीव प्राण्यांना सुद्धा आपण ठेवलेलं नांव असतं. मग कुत्रा, बैल, गाय, घोडा, मांजर, पोपट यांचा टायगर, सर्जा, कपीला, चेतक असं होतं. आणि त्या ठेवलेल्या नावानेच त्यांना प्रेमाने हाक मारली जाते.

तसच आजुबाजूच्या काही जणांना त्यांच्या दिसण्यावरुन, वागण्यावरून, राहण्यावरुन सुध्दा नावं ठेवतो‌‌. पण बऱ्याचदा अशी आपण ठेवलेली नांव प्राण्यांचीच असतात. म्हैस, पाल, बोकड, मांजर, गाढव इ…. या सारख्या नावांनी आपण त्यांचा प्रेमळपणे उल्लेख करतो. जाड्या, बारक्या, काळ्या अशी सुध्दा काही नावं आपण ठेवतो. म्हणजे प्राण्यांची चांगल्या नांवाने आणि माणसांची प्राण्यांच्या नांवाने ओळख आपल्याकडेच असावी.

एकाच देवाला अनेक नांवं आपल्याकडेच असतील. सुर्य, गणपती, विष्णू, हनुमान या सारख्या अनेक देवांना अनेक नावं आहेत. देव कशाला… झाड, तरु, वृक्ष… फुलं, सुमन… जल, पाणी. आभाळ, गगन, आकाश, नभ….. अशी एकाच गोष्टीला अनेक नावं असणारी अनेक उदाहरणं आहेत.

लहानपणी तर समानअर्थी शब्द लिहा…… असा प्रश्न सुद्धा परिक्षेत असायचा.

आपल्या नावामुळे त्या क्षेत्राचं आणि देशाचं नांव मोठं करणाऱ्यांची संख्या आपल्याकडे इतकी आहे की सांगतासुध्दा येणार नाही. आणि अशी असंख्य नांवं प्रत्येक क्षेत्रात आहेत. यात व्यक्ती, वस्तू, निसर्ग, वनौषधी, स्थळ या सगळ्यांचा हातभार आहे. पण ओळखले जातात सगळे नावानेच‌‌.

नावाचा प्रभाव आपल्या कडे इतका आहे की आजही काही ठिकाणी काही काम करुन घ्यायचे असेल तर आपण कोणाच्या तरी नावाचा आधार घेतोच.

पण… अरे तो कोपऱ्यावर पानवाला आहे ना…… त्याला माझं नांव सांग तो बरोबर माझं पान देईल……… इतका विश्वास नावात असतो..

ठेवलेलं नांव उच्चारतांना झालेली चूक आपल्याकडे काही वेळा चालते. जसं प्रवीण ला परवीन, प्रमोद ला परमोद, लक्ष्मी ला लक्शमी अशी हाक मारणारे सापडतील. पण कागदोपत्री नावाची अशी चूक चालत नाही. पण तरीही नावाच्या बाबतीत काही वेळा तशी चूक  होतेच. आणि नांवातली चूक बदलण्यासाठी खटाटोप करावा लागतो. शुद्ध नावाच्या बाबतीत असलेला हा अशुद्ध पणा सुध्दा आपल्याकडेच असेल.

राजकारणात तर नावाचं महत्त्व विचारु नका. नांव आहे म्हणून गोंधळ, नांव नाही म्हणून नाराजी, नांव बदललं तर विरोध, नावात बदल करण्यासाठी गदारोळ. काही नांव तर फक्त घराण्यामुळे ओळखली जातात. तर काही नावामुळे घराण्याचा मोठेपणा आजही शाबूत आहे. हे सगळं फक्त नावामुळेच होतं.

देश आणि त्यातले भाग यांना नांव बहुतेक सगळ्याच ठिकाणी असतील. पण आपल्याकडे खाद्यपदार्थ सुद्धा भागानुसार ओळखले जातात. जसं पंजाबी डिश, गुजराती थाळी, महाराष्ट्रीयन जेवण, साऊथ इंडियन डिश आणि हे सगळीकडे मिळतात. आज असंख्य पदार्थ नावामुळेच ओळखले, मागवले, आणि खाल्ले जातात. फक्त पदार्थांच्या नावामुळेच बऱ्याच ठिकाणी मेनू कार्ड गरजेपेक्षा जास्त मोठी, लांबलचक वाटतात. या बाबतीत आपण आपल्या सीमा खूप वाढवल्या आहेत. म्हणजे आज छोट्या छोट्या गावात सुद्धा चायनीज सहज मिळतं.

फक्त रोटी या नावाखाली पाच सहा प्रकार, डोसा या नावाखाली पंधरा विविध प्रकारचे डोसे मेनू कार्ड वर पाहिले आहेत. तांदूळ, गहू, आंबा यात चिनोर, कोलम, बासमती, चंदूसी, लोकवन, हापूस, लंगडा, केशर, बदाम अशी अनेक नांवं आहेत.

आंबा यात केशर, बदाम हा प्रकार आहे. पण केशर आणि बदाम यात आंबा हा प्रकार नाही.

जसं खाण्याच आहे तसंच कपड्यांच, वस्तूंचं, दागिन्यांच सुद्धा आहे. पंजाबी ड्रेस, गुजराती साडी, जोधपुरी, पुणेरी पगडी, कोल्हापुरी फेटा, साज, चप्पल.

असं किती आणि काय काय सांगणार. आणि हे सगळे प्रकार नावावरुच ओळखले जातात.

आजही नावावरुन भविष्य सांगणारे, आणि भविष्यात आपले नांव उज्वल करणारे अनेक जण आहेत, आणि होतील.

देशापासून वेशा पर्यंत, खाण्यापासून नटण्यापर्यंत, आणि वस्तू पासून व्यक्ती पर्यंत नावातच खूप काही आहे.

हे तर फक्त नावाचेच आहे. आडनावाचा भाग अजून वेगळाच आहे. पण त्याच्या आड बऱ्याच गोष्टी येत असल्याने त्याचे नाव आत्ता नको………

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ झाडपण… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

☆ झाडपण… ? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

जिवे मारणार्‍याला फाशी, झाड उखडणार्‍याला दंड असे कायदे आले.

कोणी म्हणे बरे झाले ; हत्येचे प्रमाण कमी झाले.

पण हाऽऽय!!

लोक अती शहाणे झाले आणि हाफ मर्डरचे प्रमाण वाढले.

मग काय? कायद्यात राहून माणूस माणसाचा एक प्रकारे बळीच घेऊ लागला.

तोच नियम त्याने झाडालाही लावला. रस्ता रुंदीकरण, अतिरिक्त बांधकाम, क्षेत्राचा विकास या नावाखाली मोठमोठी झाडे भुंडी करून टाकली तर काही उखडूनच टाकली.

झाडांनाही जीव असतो हे माहित असूनही का एवढी क्रूरता?

प्राणवायू दात्याचे प्राण हरण केले म्हणून फक्त काही पैशांचा दंड एवढीच शिक्षा?

मुके झाड•••• बोलता येत नसले तरी कृती करणे सोडत नाही.

झाडाला भुंडे केले तरी संकटांवर मात करण्याची शिकवण ते देत रहाते.

पाऊस पडला की जीव जगवते. पालवी फुटून चैतन्य जागवते आणि शक्य असेल तर फळा फुलांनी याच माणसाचे मन पोटही भरते••••

आता तरी जागे व्हायला पाहिजे. या उपयुक्त झाडांची कत्तल थांबवायला पाहिजे.

मरणासन्न झाड झाले

तरी दातृत्व त्याचे न मेले

शिकवण घे रे माणसा तू

पाहिजेस तुझ्यात झाडपण जपले

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “पैंजण…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “पैंजण” ☆ सौ राधिका भांडारकर

पैंजण या शब्दाच्या उच्चारातच एक मधुर छुमछुम जाणवते.  या शब्दाबरोबर मनात जणू अमृतधाराच बरसतात.

पैंजण हा एक तीन अक्षरी अनुनासिक शब्द.  पण तो ओठावर येता क्षणीच निसर्गातली संपूर्ण रसमय रुणझुण घेऊनच अवतरतो.  पैंजण या शब्दात लाडीक भाव आहेत. लडिवाळपणा आहे,  वात्सल्य आहे,  गुलाबासारखा बाल पावलांचा स्पर्श आहे,  एक मधुर ठेका आहे.  पैंजण या शब्दात गुलकंदाचा रस आहे.  आणि एक लाजरा बुजरा, हळुवार, गुदगुल्या करणारा, गोड शृंगारही आहे. त्या शृंगारात भक्ती आहे आणि कामातुरताही आहे.

मराठी भाषेत शब्दांचे भांडार अथांग आहे.  त्यातलाच हा एक तीन अक्षरी शब्द, पैंजण.  मधुर रसात घोळूनच तो ओठावर येतो.  पैजण या शब्दात जसा नाद आहे तसाच त्यात अंतरातला  लपलेला साजणही  आहे. त्याला प्रीतीची ही रुणझुणाती चाहूल कळावी म्हणूनच हे पैंजण.

पैंजण हा एक स्त्रियांचा अलंकार.  भारतीय स्त्री ही नखशिखांत अलंकारांनी मढलेली असते.  तसे गोठ, पाटल्या, चपलाहार,ठुशी,वज्रटीक, बाजूबंद,  एकदाणी,  या काहीशा अहंकारी, रुबाबदार,प्रदर्शनीय अलंकारात तसे पाहिले तर पैंजण हा पायातला अगदीच चतुर्थ श्रेणीतला अलंकार म्हणावा लागेल.  एकतर पायातला म्हणून चांदीचा. हलका, जरासा नाजूकच.  चांदीच्या नक्षीदार साखळीत लटकवलेले चांदीचे छोटे किणकिणणारे नूपुर.  पण पावलावर हे घुंगुरवाळे चढवले की त्या पावलांचं  रूपच पालटतं.  नुसतं रूपच नव्हे तर चालही  बदलते.  या चालीलाही एक खट्याळ, लडिवाळ, गोडवा प्राप्त होतो.अलौकिक सौंदर्य देतात हे पैंजण. आणि मग कुणा प्रेमिकाच्या तोंडून सहज उद्गार येतात,

” आपके पाव देखे, बहुत हसीन है, इन्हे जमीन पर मत उतारिएगा, मैले हो जायेंगे”… क्या बात है!

पैंजण हा शब्द इतका गोजिरा आहे की तो लहान बाळाच्या पावलांशी एक निरागस नातं जोडतो.  नुकतंच पावलं उचलायला लागलेलं बाळ पायात पैंजण घालून दुडदुड चालू लागतं तेव्हा ती हलकी छुमछुम इतकी कर्णमधुर वाटते की कितीही कामात गुंतलेली माय असो, ती नाजूक छुमछुम ऐकून धावत आपल्या बाळाला उचलून घेते आणि त्याचे वात्सल्याने असंख्य पापे घेते.  या मायेच्या दृश्यात त्या पैंजणांची छम छम एका  लडिवाळ भूमिकेत असते.  त्यावेळी ती माय कौसल्या असते आणि ते बाळ पायी पैंजण घालून राजवाड्यात दुडदुडणार्‍या रामा सारखंच असतं.

पैंजण हा शब्द कधीकधी  पार यमुना तिरी घेऊन जातो. नटखट कान्हा आणि बावरी राधा यांच्या प्रणयात पैंजणांची एक कोमल भूमिका आहे.  प्रेमाचं ते पार्श्वसंगीतच म्हणा ना.

। पायी पैंजण पैंजण वाजती।

 ।ही  राधा गौळण हरीला लाजती।।

एका अद्वैत प्रेमाचं आणि भक्तीचं दर्शनच जणू या राधेच्या पायातले पैंजण करून देतात.  या शब्दाबरोबर राधा— कृष्णाची प्रणय रंगात दंग झालेली  मूर्तीच डोळ्यासमोर येते.  त्या रुणझुण नादाबरोबर कृष्णाच्या बासरीचे सूरही कानात घुमायला लागतात.

कधी कधी प्रेमाचे काही उडते भाव या पैंजणात जाणवतात.

“चाळ माझ्या पायात

पाय माझे तालात

नाचते मी तोऱ्यात मोरा वाणी रे

काय तुझ्या मनात

सांग माझ्या कानात

गोड गोड गुपित तुझ्या मनी रे ..”

किती बोलतात हे  पैंजण!  किती भाव किती रस ते व्यक्त करतात!

वास्तविक पैंजण, नूपुर, चाळ, घुंगुर, हे सारेच एकधर्मीय पद आभूषणे.  पदालंकार.  त्यांचे संबंध पदन्यासाशी.त्यांचे नाद जरी वेगळे असले,  त्यांच्या रुणझुणतेची,  छन-छनीची पट्टी जरी वेगळी असली तरी नातं पदन्यासाशीच,  पावलांच्या तालाशीच.  पण तरीही त्यांची घराणी वेगळी आहेत.  घुंगुर म्हटले की ते थेट आपल्याला मैफलित घेऊन जातात.

” राजसा जवळी जरा बसा” किंवा “पाडाला पिकलाय आंबा” नाहीतर,

“ठाडे रहियो ओ बाँके यार” अशा गाण्यांची आठवण करून देतात.त्यांचं सख्य ढोलकीशी किंवा सारंगीशी. पण पैंजण कसे अंगणातले वाटतात.  प्राजक्ताच्या फुलासारखे ते हळुवार टपटपतात.  हरित पर्णातून एखादी हलकी झुळूक यावी तसा त्यांचा नाद भासतो.  पैंजण नादात  एक स्निग्धता जाणवते, मार्दव आणि माधुर्याचा अनुभव येतो. पैंजण झुळझुळणाऱ्या नदीची आठवण देतात.  किनाऱ्यावर हलकेच चुबकणाऱ्या लाटेसारखे ते असतात. पैंजणात तांडव नसते, क्रोध नसतो, थयथयाट  नसतो,  वादळ नसते.  पैंजणांची रुणझुण केतकीच्या बनात नेते.  अलगद हळुवार मोरपिसासारखी ती कानाशी हुळहुळते.

भराभर डोंगर चढून जाणारी, नाभीच्या खाली गुडघ्यापर्यंत घट्ट वस्त्र लपेटलेली एखादी आदिवासी शिसवी कांती असलेली कातकरीण दिसली की माझी नजर तिच्या भेगाळलेल्या पावलांवर जाते आणि तशातही त्या रापलेल्या,तुकतुकीत, काळ्याभोर पावलांवरचे छुम छुमणारे पैंजण कसे एखाद्या प्रेमळ सखी सारखे मला भासतात.  पायातलं ते बंधन न वाटता प्रेमाने गोंजारणारं  ते साधन वाटतं.  शिवाय पैंजणाला धनवान, श्रीमंत, गरीब, गळीत असा भेदभाव नसतो.  ते कुणाचीही पावलं खुलवतात.

हे सगळं लिहीत असताना मी माझ्या पावलांकडे सहजच पाहिलं, आता तिथे थंडीपासून रक्षण करणारे लोकरीचे मोजे होते.  आणि मग सहज मनात आलं, खरंच पैंजण म्हणजे मूर्तिमंत बालपण.  पैंजण म्हणजे हिरवाईचे तारुण्य. एक सुरेल छन छना छन, सप्तसूरातला लटका शृंगारच जणू!

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दुरंगी… ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ दुरंगी… ☆ श्री अरविंद लिमये ☆

माणूस सहज दिसतो, जाणवतो तसाच असतो असं नाही.तो खऱ्या अर्थाने समजतो ते दीर्घ सहवासानंतरच.माणसाचं हे वैशिष्ट्य कांही अपवादात्मक शब्दांमधेही जाणवतं.दाद हा असाच एक शब्द.हा शब्द ऐकताच त्याचा ‘उत्स्फुर्त प्रतिक्रिया ‘ हा आपल्या मनाला भावलेला अर्थच चटकन् जाणवतो.पण ‘दाद’ या शब्दाचा पैस असा एका अर्थाच्या मर्यादेत मावणारा नाहीय.

एखादी चांगली गोष्ट मनाला स्पर्शून गेली की त्या स्पर्शाची नकळत उमटणारी प्रतिक्रिया म्हणजे ‘दाद’ ! ही उस्फुर्त प्रतिक्रिया व्यक्त करणे म्हणजे ‘दाद’ देणे.ही दाद म्हणजे ‘ग्रेट’,’मस्तच’,’वाह..क्या बात है..’ यासारखे मनाच्या तळातून उमटलेले तत्पर उद्गार असतील,किंवा नकळत वाजलेल्या टाळ्याही असतील.

क्वचित कधी एखाद्या चांगल्या गोष्टीबद्दलची आपली सकारात्मक प्रतिक्रिया उघडपणे सहज व्यक्त न करणारेच बरेच जण असतात.त्यांची अंत:प्रेरणा तेवढी सशक्त नसल्यामुळेही असेल कदाचित,पण त्यांना व्यक्त होण्यासाठी बाह्यप्रेरणेची गरज लागते.एखादं भाषण ऐकताना किंवा नाटक बघताना मनाला स्पर्शून गेलेल्या एखाद्या वाक्यानंतर किंवा उत्कट प्रसंगादरम्यान क्षणिक कां होईना शांतता पसरते.लगेच टाळ्यांचा आवाज येत नाही.मग क्षणार्धात कुणी दोन चार जणांनी टाळ्या वाजवल्याचा आवाज येताक्षणी त्याने प्रेरित झालेल्या असंख्य प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट सुरु होतो.’ दाद ‘ या शब्दाला ती देण्यासाठी अशी ‘प्रतिक्षा’ अपेक्षित नाहीय. ‘उत्फुर्तपणा’ हा या शब्दात मुरलेला अविभाज्य घटकच आहे.

‘दाद’ हा कांही कौतुक किंवा शाबासकी या शब्दांचा समानार्थी, पर्यायी शब्द नाहीय.तरीही कौतुकाने पाठीवर दिलेली शाबासकी जसा ती  मिळवणाऱ्याला आनंद, प्रोत्साहन,समाधान देते तसाच आनंद,समाधान न् प्रोत्साहन उत्फुर्तपणे दिली गेलेली दादही देते.आणि देणारा आणि घेणारा दोघांनाही सकारात्मक उर्जा देणारी दादतर दाद या शब्दाला अधिकच अर्थपूर्ण बनवते. ‘कौतुक’ आणि ‘दाद’ या दोन्ही शब्दा़ंत आणखी एक साम्य आहे. सतत होणाऱ्या कौतुकाची जशी चटक लागते,तशीच एखाद्या कलाकाराला ठराविक वेळी मिळणारी ‘दाद’ इतकी सवयीची होऊन गेलेली असते की एखाद्या प्रयोगांत ‘त्या’ क्षणी, त्या ठराविक प्रसंगात किंवा त्या ठराविक वाक्याला टाळ्या मिळाल्या नाहीत तर कांहीतरी हरवल्यासारखा तो कलाकार अस्वस्थ होऊन त्या भूमिकेतला ताल न् तोल हरवून बसल्याची उदाहरणेही आहेत.

मोकळेपणाने एखाद्याचे कौतुक करण्यासाठी मन मोठे असावे लागते हे खरे,पण दाद देण्यासाठी फक्त त्या क्षणकाळापुरता स्वत:चाच विसर पडणे हेच अपेक्षित असते.आपलं ‘मी’पण त्या क्षणापुरतं कां होईना गळून जातं तेव्हाच आपल्याकडून उमटणारी प्रतिक्रिया ‘उत्स्फुर्त’ असू शकते. आणि हेच ‘दाद’ या शब्दाला अपेक्षित असते.

‘दाद’ या शब्दाला मी ‘दुरंगी’ म्हणतो ते एका वेगळ्याच कारणाने.या शब्दाचं परस्पर विरुद्ध असं दुसरंही एक रुप आहे.आत्तापर्यंत वर उल्लेखित विवेचन वाचले की ‘दाद’ ही द्यायची असते असेच वाटेल.पण कांहीबाबतीत ‘दाद’ ही मागावीही लागते.स्वत:वर अन्याय होतो तेव्हा त्याविरुध्द तक्रार केली जाते ते एक प्रकारचे ‘दाद’ मागणेच असते.दाद मागितली तरी न्याय मिळतोच असे नाही पण न्याय मिळण्यासाठी दाद मागावीच लागते असं विरोधाभासी वास्तव ‘दाद’ या शब्दांत सामावलेलं आहे.

दाद’ या शब्दाचे हे पूर्णत: वेगळे दोन्ही अर्थरंग मात्र अर्थपूर्ण आहेत एवढे खरे.अशा विविधरंगी अर्थपूर्ण शब्दांमुळे अधिकच खुलणाऱ्या भाषासौंदर्याला म्हणूनच मनापासून दाद द्यावीशी वाटते.

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “सी.सी.टि.व्ही. आणि बुट…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “सी.सी.टि.व्ही. आणि बुट…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

तो भुंकण्याचा आवाज आला, आणि घरातली सोडून सगळ्या मोकाट कुत्र्यांना समजलं की आपल्याला एकत्र बोलवलं आहे.

गल्लीत घरांच्या, झाडांच्या आडोश्याला असलेली, कडक उन्हापासून गारवा मिळावा म्हणून गटारीच्या पाण्यात बसलेली, किंवा चारचाकी गाडीच्या सावलीत विसावलेली सगळी कुत्री अंग झटकत, शेपटी, मान, कान हलवून, पुढचे पाय शक्य तेवढे पुढे, आणि मागचे पाय शक्य तितके मागे घेत आळस झटकून तयार झाली.

अस काय झालं? की सगळ्यांना बोलवावं  लागतंय याच विचारात ती सगळी आवाजाच्या दिशेने निघाली.

कोणत्याही वेळी सगळ्यांना सहज पळता यावं म्हणून मुद्दामच मोकळ्या पटांगणात झाडाखाली सगळे जमले होते. वेळ सुद्धा भर दुपारची निवडली होती. कारण उन्हामुळे शक्यतो कोणी माणसं बाहेर पडत नाहीत.

जवळपास सगळे आले आहेत याची खात्री झाल्यावर त्यातील वयस्कर कुत्र्याने बोलायला सुरुवात केली.

काल एका कुत्र्याने एका गावात बंगल्यातून बुट पळवल्याच सी.सी.टि.व्ही. मुळे सगळ्यांना समजलं. आणि त्याची बातमी झाली.

एक तरूण कुत्रा – वा मस्त……. त्यामुळे आपली वेगळी बातमी आली…… नाहीतर आजपर्यंतच्या सगळ्या बातम्यांमध्ये आपल्याला मोकाट, भटकी असं म्हणत फक्त भटकतांनाच दाखवलं आहे.

वयस्कर कुत्रा – प्रश्न तो नाहीच. आता आपण बंगल्यातले बुट पळवायला लागलो म्हणून आपलं जगणं अजून कठीण होणार आहे.

आता हि बातमी आणि ते सी.सी.टि.व्ही. मधे झालेलं शुटिंग मोबाईल मुळे गावागावात, गल्ली गल्लीत पसरेल. ज्याने बुट पळवला त्याला तर मारतीलच, पण नाहक इतर कुत्र्यांना सुध्दा मार पडेल.

अरे……. एखादा माणूस चोरी करतांना सापडला तर त्याला लोक बेदम मारतात. वर म्हणतात कुत्र्यासारखं मारलं म्हणून.

आता आपल्याला तसंच मारल्यावर काय म्हणतील ते……… आहे काही बोलायला जागा…….

अरे हि माणसं सुद्धा चोरी करतांना चेहरा दिसू नये म्हणून तोंड झाकून घेतात. आपलं काय?……. आपलं सगळं उघडंच असतं, आणि आपणही उघड्यावर असतो.

मी म्हणतो आपण बंगल्यात जायचंच कशाला? तिथे त्यांची पाळलेली कुत्री असतातच. अजून आपली भर कशाला?… बऱ्याच बंगल्यावर कुत्र्यापासून सावध रहा अशी पाटी असते. जास्त चांगलं समजावं म्हणून कुत्र्याच्या तोंडाच चित्र सुध्दा असतं. मग आपण समजायला पाहिजे नां…………

बरं बुट पळवायचा तर एखादं साधं घर बघितलं असतं. कुत्रा बुट पळवतोय म्हटल्यावर घरातल्या किंवा आजुबाजूच्या कोणी बघितलं असतं तर कदाचित दुसरा बुट अंगावर भिरकावला असता. आता बंगल्यातूनच बुट पळवला म्हटल्यावर आपल्याला दिसतील तिथून दिसतील तसे पकडण्याचा बुट निघाला तर…… मग काय करणार…

आधीच आपलं जगणं कुत्र्याचं त्यात ही जास्तीची धावपळ कशी करणार……. लोकं उरलं सुरलं आपल्याला खायला टाकतातच. किंवा त्यांनी टाकल्यावर आपण ते खायला जातो. मग बुटाचा हव्यास कशासाठी? एक बुट पळवल्यामुळे लोक आता आपल्याला जोड्याने मारतील.

एरवी आपल्या भागात कोणी अनोळखी आल्यावर आपण भूंकतो, त्यामुळे लोकं सावध होतात. आता आपल्या भूंकण्याने लोक सावध होतील, पण अगोदर काठी हातात घेऊन त्यांचे बुट जागेवर आहेत ना हे बघतील.

आधीच माणसांमध्येच माणसं पळवापळवीच्या बातम्या येत आहेत. त्यात आपण हे बुट पळवापळवीचे उद्योग करायचेच कशाला? आता कोणी इतरांनी बुट पळवला तरी आपलंच नांव येईल. त्यामुळे आता पुढील काही दिवस काळजी घ्या. असे म्हणत सगळे परत आपापल्या आडोशाला जायला निघाले.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “डॉक्टर काका सांभाळा !” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

 🌸 विविधा 🌸

☆ “डॉक्टर काका सांभाळा !” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

लहानपणी डॉक्टर हा आमच्या कुटुंबाचाच एक भाग असायचा. सहसा त्याला फॅमिली डॉक्टर म्हटलं जायचं. आमच्या कोणत्याही दुखण्या खुपण्यावर तेच उपचार करायचे.  फारसे स्पेश्यालिस्ट त्यावेळी नसायचे अन त्याची फार मोठी गरज भासल्याच कांही आठवत नाही. ऑपरेशन वगैरे साठी साधारणपणे जिल्ह्याच्या गावी जावे लागत असे. तरीही फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्यानेच ते चालत असे. फॅमिली डॉक्टर म्हणजे काका मामाच !  आम्ही त्यांना डॉक्टरकाकाच म्हणायचो. डॉक्टरना मारणे तर दूरच पण सगळे डॉक्टरकाकांच्या नजरेच्या धाकात असायचे. डॉक्टरांचा सूरही नेहमी आश्वासक, चेहरा हसरा, वाणी मधुर, कधी कधी आम्हा मुलांना दटावणारी सुद्धा !  पण हे खूपच छान कौटुंबिक संबंधांचं नातं असायचं. अगदी आम्हाला मुलं होई पर्यंतच्या वेळेपर्यंत हे असं चांगल्या कौटुंबिक संबंधांचं वर्तुळ होतं. डॉक्टरांच्या प्रामाणिकपणाविषयी संशय नव्हता. कांही वाईट घडल्यास डॉक्टरांना नव्हे दैवाला दोष दिला जायचा.

असे छान दिवस चालले होते. आम्ही मोठे झालो आमचे मित्रही डॉक्टर झाले. आणि एके दिवशी आमच्या डॉक्टर मित्राकडून ती बातमी समजली. कोर्टाच्या एका निकालाने वैद्यकीय सेवा ही ग्राहक संरक्षण कायद्याखाली आणली.  खरं म्हणजे तिथंच या सर्व संबंधाची फाटाफूट झाली असावी.  कौटुंबिक नाती कायदेशीर झाली. विश्वास जाऊन कायदा आला.. समजुतदारपणा जाऊन कोर्ट कचे-या आल्या. आपली ट्रीटमेंट बरोबर होती हे कायद्याने सिद्ध करण्याची जबाबदारी डॉक्टरांवर आली. त्यासाठी कायदेशीर रेकॉर्ड्स आली. मग ऑपरेशन पूर्व तपासणी ऑपरेशन नंतर  तपासणी, ट्रीटमेंट रेकॉर्ड वगैरे सर्व सर्व आवश्यक ठरू लागलं. त्यासाठी स्टाफ, रुग्णालयांची अद्ययावत कार्यालये,, असिस्टंट्स, लॅबोरेटरीज वेगवेगळ्या टेस्ट्स, अद्यायावत यंत्रसामुग्री, मल्टीस्पेशालिटी  हॉस्पिटल्स, कोट्यावधीची यंत्रसामुग्री आणि उपकरणांसाठी आवश्यक म्हणून वातानुकूलन यंत्रणा, या सर्वांचा देखभाल खर्च आणि त्या साऱ्यांसाठी लागणारा प्रचंड पैसा. वाढती महागाई व वाढलेले स्टॅंडर्ड ऑफ लिविंग  या सर्वाना आवश्यक असणाऱ्या प्रचंड पगार व मानधनाच्या रकमा. एक एक वाढतच गेले. आणि शेवटी या सर्व रकमांची भरपाई करण्याची जबाबदारी पेशंटवर !

एवढ्या प्रचंड रकमा भरताना पेशंट सुद्धा मग त्या पैशातून पंचतारांकित सुविधा मागू लागले. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करून यांना आकर्षित करण्यासाठी मार्केटींग यंत्रणा, कमिशन्स. एवढ्या मोठ्या रकमा भरताना घडून येणारे कटू प्रसंग. मग आधी पैसे भरा, डिपॉझिट भरा, मगच ऍडमिट असा ट्रेंड सुरु झाला.  पेशंट साठी वापरल्या गेलेल्या मटेरियलच्या  हिशोबात सुरुवातीला योग्य वाटणाऱ्या हॉस्पिटलना सुद्धा आकार वाढल्यावर स्टाफवर  कंट्रोल ठेवता येईनासा झाला. मग स्टाफ कडून होणारे गैर प्रकार, कधी कधी डॉक्टर सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करू लागले कारण प्रशिक्षित स्टाफ दुर्मिळ काय करणार ?  त्यातूनच नव्या नव्या प्रकारचे रोग आणि लोकसंख्या वाढीच्या विस्फोटामुळे वाढणारी पेशंटची संख्या. हा वाढीचा फुगा फुगतोच आहे. या सर्वात डॉक्टरांचा दोष कुठे ?  पण जबाबदारी मात्र डॉक्टरांवर !  व्यवसाय वाढला कि गैरप्रकार वाढतात.  जसं सरकारचा व्यवसाय सर्वात मोठा म्हणून त्यात गैरप्रकार सर्वात जास्त कारण कंट्रोल ठेवणे अवघड.  नंतर काही खासगी हॉस्पिटलची अवस्थाही सरकारी हॉस्पिटलसारखी झाली पण पैसे मात्र सरकारी हॉस्पिटल पेक्षा प्रचंड जास्त. या दुष्टचक्राची व्याप्ती मात्र वाढता वाढता वाढे भेदिलें आरोग्यमंडळा अशी होत गेली.

आता या सर्वांचेच दुष्परिणाम दिसू लागलेत. व्यापारी आणि ग्राहक हा नाते संबंध सतत लुटणारा आणि लुटला जाणारा असेच समीकरण फार पूर्वीपासून मनावर ठसवले गेले आहेच, त्यात डॉक्टर व पेशंट या नातेसंबंधांची भर  पडली. डॉक्टरांचे अनुभव जसे खरे तसेच पेशन्टचेही अनुभव खोटे नव्हते. यातूनच वाढती आहे दरी.

डॉ अरुण लिमयेचें  ‘क्लोरोफॉर्म ‘ वाचले आणि आम्हीच तोंडात बोटे घातली  हे असं असतं ?  खरं  तर त्याच वेळेला सरकार व डॉक्टर्स यांनी अशा गैरप्रकारांना कसा आळा घालता येईल ? याचा विचार केला असता तर आज चाळीस वर्षानंतर वेगळेच चित्र दिसले असते. दुर्दैवाने तसे घडले नाही.  त्यातून डॉक्टर हॉस्पिटल्स यांचे गैरप्रकार कमी न होता वाढतच गेले.  समाजातील दोन घटकांमधील दरी वाढतच गेली.

समाज मनातील संशयाच्या भुताने आज उग्र रूप धारण केले आहे. कायदा व कोर्ट हे कोणत्याही गोष्टीचं समाधानकारक उत्तर असू शकत नाही. कायद्याला भावना नसतात पण माणसांना असतात. कोर्टामध्ये  निर्णय मिळतो न्यायाबद्दल खात्री देता येत नाही. समोर आलेले पुरावे व त्याचा अन्वयार्थ लावण्यामागची तार्किकता यात माणसामाणसात फरक असतो. एका कोर्टाने फाशी दिलेला माणूस दुसंं-या कोर्टात निर्दोष सुटू शकतो. खरं काय ? न्याय कोणता ?  आपण सर्वसामान्य  माणसं ! आपण नातेसंबंध सुधारू शकलो तरच यातून उत्तर मिळू शकेल.  आमच्या लहानपणीची डॉक्टरशी असलेल्या नातेसंबंधांची व कौटुंबिक संबंधांची पुनर्स्थापना होऊ शकेल का ? आमची नातवंडे नव्या डॉक्टरांच्या अंगाखांद्यावर डॉक्टरकाका म्हणून खेळू शकतील का ?  आज तरी भविष्य धूसर दिसतंय !

डॉक्टर काका सांभाळा  स्वतःला !!!

©  श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares