मराठी साहित्य – विविधा ☆ गूढ असं बरंच कांही… ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ गूढ असं बरंच कांही… ☆ श्री अरविंद लिमये ☆

स्वप्न म्हंटलं किं ‘मुंगेरीलालके हसीन सपने’ आठवणं सहाजिकच आहे.पण ‘स्वप्न’ म्हणजे फक्त तेवढंच नव्हे.मुंगेरीलालसारखे दिवास्वप्ने पहाणारे जसे आहेत तसेच आयुष्यातलं नेमकं उद्दीष्ट ठरवून त्यादिशेने प्रदीर्घकाळ अथक, प्रयत्न न् कष्ट करीत ध्येय प्राप्तीनंतरचा स्वप्नपूर्तीचा कधीच न विरणारा आनंद मिळवणारे आणि जपणारेही आहेतच. दिवास्वप्नं पहात स्वप्नरंजनात मश्गूल रहाणाऱ्यांबाबतची किंव आणि स्वप्नपूर्तीसाठी जीवाचं रान करणाऱ्यांबद्दलचा कौतुकमिश्रित आदर यांना निमित्त होणाऱ्या स्वप्नांच्या या दोन रुपांमधे गूढ असं कांहीच नाहीय.पण प्रत्येकालाच सुप्तावस्थेत दिसणाऱ्या स्वप्नांमधे मात्र कधीच थांग न लागणारं गूढ ठासून भरलेलं आहं.ती स्वप्ने हेच एक गूढ विश्व आहे. जाणवतं, दिसतं.. पण ते जसंच्या तसं इतरांना त्याचवेळी दाखवता मात्र येत नाही. ते खास ज्याचं त्याचंच असतं. त्या क्षणांपुरतं त्याच्यासाठी अगदी खरं..तरीही तो एक भासच.भास-आभासाचा चकवा देत रहाणारा एक खेळ!

‘स्वप्न’ मला एखाद्या भरकटत गेलेल्या नाटक किंवा सिनेमासारखं वाटतं.बघताना त्यात गुंतत जात असलो तरी त्यातून बाहेर पडल्यावर न पटणारं, असंबद्ध, अविश्वसनीय सगळं कृत्रिम,तद्दन काल्पनिक, कशाचा कशाला मेळ नसणारं असं काहीसं वाटत रहाणारं..!

खरंतर स्वप्न एखाद्या नाटक किंवा सिनेमातल्या प्रसंगांच्या विखुरलेल्या तुकड्यांसारखंच तर असतं.आपल्या मन:पटलाच्या रंगभूमीवर दिसणारं नाटक किंवा मन:पटलाच्या पडद्यावर दिसणाऱ्या सिनेमासारखं..!स्वप्न आपण समोर बसून नाटक-सिनेमासारखं पहातही असतो आणि अकल्पितपणे त्याचाच एक भाग बनून स्वतः त्यात भूमिकाही करत असतो. तरीही आपला स्वतःचाच मन:पटलावरचा आपलाच वावर समोर बसून पहावा तसं पाहूही शकत असतो.सगळंच गूढ.. अतर्क्य..!

हे स्वप्न पडणं जसं तसंच त्यांचं विरणंही तितकंच गूढ!त्याचा थांगच लागू नये असं.मला स्वतःला आजपर्यंत पडलेल्या असंख्य स्वप्नांपैकी अगदी मोजकीच स्वप्ने आज आठवतात हे जसे , तसेच इतर न आठवणाऱ्या स्वप्नांचे विरुन जाणेही मला अनाकलनीय वाटतं आलंय हेही खरेच.स्वप्न पहात असताना त्यातले सगळेच घटना-प्रसंग एखाद्या वास्तव क्षणांसारखे अनुभवत असताना त्या क्षणी मनाला झालेल्या त्या स्वप्न-घटनादृश्यांच्या स्पर्शांची जाणिव, त्या स्पर्शांमधला त्या त्या वेळचा दिलासा,आनंद किंवा दुःख, वेदना,थरारही लख्ख जाणवत राहिलेला पुढे बराच वेळ. पण दचकून जाग येताच कुणालातरी ते स्वप्न, तो अनुभव सांगावं असं उत्कटतेने वाटत असतानाच जादूची कांडी फिरावी तसं सगळंच विरून गेलेलं..! हे विरुन जातंच कसं आणि कुठे हे प्रश्नही स्वप्ने कां आणि कशी पडतात या प्रश्नांसारखीच अनुत्तरीत, अनाकलनीयच! या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचं काम मानसशास्त्रीय संशोधनाद्वारे अखंडपणे सुरु आहेही.पण ‘आपल्या मनातल्या सुप्त इच्छा,भावनांचा कल्लोळ, दडपणं,नैराश्य,अस्वस्थ करणारे त्रासदायक विचार..असं सगळ्याचं आपल्या सुप्तावस्थेत चित्रभाषेत प्रकट होणं म्हणजे स्वप्न’ यासारखे आजवरच्या संशोधनाचे निष्कर्ष मला तरी अनेक शक्यतांपैकी फक्त एक शक्यता आहे असेच वाटते. एखाद्या हिमनगाचे टोक दिसावे तसे न् तेवढेच.स्वप्नाच्या गूढ अर्थांच्या एका सूक्ष्म कणाएवढे!कारण स्वप्नांच्या इतर अतर्क्य, सूचक,प्रेरणादायी,दृष्टांतसदृश स्वप्न-प्रकारांचा थांग या निष्कर्षानंतरही अद्याप कुणालाच लागलेला नाहीय.अगदी तो अनुभव,त्यातली उत्कटता ज्याने स्वतः अनुभवलीय त्यालाही नाही.

या अतर्क्य अशा सूचक स्वप्नांचा मी स्वतःही अनुभव घेतलेला आहे.अतिशय उत्कट आनंदानुभव दिलेले ते क्षण आणि त्यातील बारकाव्यांसकट ते मोजके स्वप्नानुभवही मी इतक्या वर्षांनंतरही विसरु शकत नाहीय..!आणि तरीही त्यामागील गूढ मात्र अथक प्रयत्नांनंतरही मला उकललेलं नाहीय.निदान ते उकलेपर्यंततरी ‘स्वप्न’ म्हणजे अतिशय गूढ असं बरंच कांही.. असंच म्हणावं लागेल.

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ इंजिन ऑइल बदला…. श्री मयुरेश उमाकांत डंके ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

? विविधा  ?

☆  इंजिन ऑइल बदला… श्री मयुरेश उमाकांत डंके ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆  

“ओ ताई, तुम्ही त्याला काही देऊ नका. ह्यांची सवयच आहे दिवसभर भीक मागत फिरण्याची.. वर्षानुवर्षे भीक मागत फिरतात, पण काम करत नाहीत, कष्ट करत नाहीत. काम करायचा आळस असतो. आयते पैसे मिळत असतील तर कोण कशाला कष्ट करेल?” तो दुकानदार माझ्या बायकोला सांगत होता. आणि तिच्या सोबत असलेला माझा साडेतीन वर्षांचा मुलगा मात्र “आपण त्या बाळाला बिस्कीट देऊया” असा आग्रह करत होता. 

असे प्रसंग खरंच खूप कठीण असतात. कोणत्याही स्वार्थाशिवाय किंवा मतलबीपणाशिवाय आपली मुलं आपल्याकडं दुसऱ्याच कुणासाठी तरी काही मागतात तेव्हा फार कौतुक वाटतं आणि भरूनही येतं.

पूर्वानं त्यांचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं आणि ती त्यांना म्हणाली, “दादा, तुम्हीच त्यांना काही काम का देत नाही?” 

त्यावर तो लगेच म्हणाला, “असल्या भिकरड्याला कोण काम देणार हो?” 

“हाच तर खरा प्रॉब्लेम आहे. त्यांनी काहीतरी काम केलं पाहिजे असं तुम्ही जोरात म्हणणार आणि त्यांना काम द्या म्हटलं की मागे फिरणार. या माणसांना कुणीच काम दिलं नाही तर ही माणसं भीक मागण्याशिवाय दुसरं करणार तरी काय?” ती म्हणाली. 

“पण हे सरकारचं काम आहे. माझं नाही.” 

“जर ते सरकारचं काम असेल तर मग तुम्ही या माणसांना वाटेल तसं बोलणं बंद केलं पाहिजे, कारण ते तरी तुमचं काम कुठं आहे? तुमच्या व्यवसायाव्यतिरिक्त तुम्ही इतर कुणालाही काहीही उलट सुलट बोलू शकत नाही. कुणाला काही बोलायचं असेल तर ते सरकार बोलेल.” ती शांतपणे आणि तितक्याच ठामपणे म्हणाली. समोरच्या दुकानदाराचे डोळे टोमॅटोसारखे लाल झाले. 

“तुम्ही मला शिकवू नका. हे माझं दुकान आहे, मी कुणालाही काहीही बोलेन. तुम्ही ते सांगू नका.” तो रागाने म्हणाला. 

“हा आपला देश आहे. या देशातल्या कुणाही माणसाला तुम्ही विनाकारण काहिही बोलू शकत नाही.” ती म्हणाली. 

हा माझा पण देश आहे. मग काय मी भिकाऱ्याला काम देत बसू काय?” दुकानदार.

“हा तुमचा पण देश आहे ना? मग जसा मला सल्ला दिलात, तसा लोकांना सल्ला का देत नाही तुम्ही? ‘ मॅगी खाऊ नका, मैद्याचे पदार्थ खाऊ नका, चायनीज गोष्टी वापरू नका’ वगैरे वगैरे..?” ती. 

“असं सांगत बसलो तर धंदा बुडेल माझा. लोक या गोष्टी घेतात म्हणून तर धंदा चालतो आमचा. हे खाऊ नका असं मी लोकांना कसं म्हणू?” दुकानदार.

“म्हणजे तुमच्या फायद्यासाठी लोकांच्या प्रकृतीला हानिकारक असलेल्या गोष्टी तुम्ही विकणार आणि नफा मिळवणार. बरोबर ना?” ती.

“मग तसे सगळेच वागतात. मी एकटाच नाहीये.” तो म्हणाला. एव्हाना काऊंटर वर आठ- दहा आणि रस्त्यावर आठ – दहा माणसं गोळा झाली होती. 

“हे बघा दादा, त्या माणसाचा प्रश्न सुटावा यासाठी तुम्ही काय केलंत? तुम्ही काहीच केलं नाहीत आणि वर तो माणूस गुन्हेगार असल्यासारखं बोलताय.” ती. 

“हो मग.. ही माणसं अशीच असतात. त्यांच्या बद्दल चांगलं बोलावं अशी त्यांची लायकी तरी आहे का?” दुकानदार. 

“अहो, भिकारी म्हणजे चोर – दरोडेखोर नव्हे. त्याचं पोट भरण्यासाठी तो तुमच्याकडे पैसे मागतो. तुमची इस्टेट मागत नाही. तुम्ही दिलेल्या पैशातून तो सोनं-चांदी घेत नाही, मॉलमध्ये जात नाही, फॉरेन टूरला जात नाही. पण तुम्ही त्याची पार लायकीच काढलीत. हे चुकीचं आहे. माझी तुमच्या दुकानातली ही शेवटची खरेदी.” असं म्हणून ती बाहेर निघून आली. तिनं त्या बाहेरच्या माणसाला दोन फरसाणचे पुडे दिले आणि घरी आली. 

घरी आल्यावर मुलानं मला “आईचं दुकानात भांडण झालं बघा” अशी बातमी लगेच सांगितली. त्याला आम्ही अजून भीक आणि भिकारी या दोन्ही संकल्पना शिकवलेल्या नाहीत. ज्या लोकांकडे काम नसतं, पैसे नसतात, राहायला घर नसतं, अशी माणसं रस्त्यावर वगैरे राहतात आणि भूक लागली की लोकांकडे पैसे मागतात किंवा खायला अन्न मागतात, एवढंच त्याला शिकवलं आहे. त्यामुळं, भिकारी हे प्रकरण “खूप भूक लागलेला आणि खिशात पैसे नसलेला माणूस” एवढंच त्याच्या लेखी आहे. म्हणूनच, तो बावरून गेला होता. एखाद्या माणसाला आईनं खायला दिलं तर त्यात भांडण करण्यासारखं काय आहे, हेच त्याला समजत नव्हतं. पुष्कळ समजावून सांगितल्यानंतर तो शांत झाला. 

पण या निमित्तानं एक जाणीव मात्र आणखी घट्ट झाली की, काळ वाऱ्याच्या वेगानं बदलत असला आणि दिवसेंदिवस जग अधिकाधिक व्यावहारिक होत असलं तरीही लहान मुलांच्या मनांमध्ये माणसांविषयीचं प्रेम, आस्था, आपुलकी उपजत असते आणि ती जाणवते. आपण जितके रुक्ष, आणि व्यावहारिक कोरडेपणाने वागू त्याचंच अनुकरण मुलं करतात आणि आपसूकच तिही तशीच होतात. 

यंदा दिवाळीच्या खरेदी दरम्यान असं जाणवलं की, लहान मुलांना सामाजिक भान फार उत्तम असतं आणि ते बऱ्यापैकी नैसर्गिक असतं. मुलं काही समोरच्या मुलाला पैसे द्या असं म्हणत नाहीत. आपण त्याला खाऊ देऊ, खेळणी देऊ असं म्हणतात. पैसा हा मुद्दा त्यांच्या लेखी नसतोच. 

“स्वतःच फुगे विकणारे काका- काकू त्यांच्या मुलाला फुगा का देत नाहीत?” या प्रश्नाचं उत्तर देणं फार कठीण असतं. डी मार्ट मध्ये पॉपकॉर्न काऊंटर वरच्या काकांना त्यानं प्रश्न विचारला होता की, “तुमच्या बाळाला तुम्ही पॉपकॉर्न नेता का?” त्यावेळी त्या समोरच्या माणसाचा निरुत्तर झालेला चेहरा मी वाचला आहे. अशावेळी अंगावर काटा येतो. पण माझ्या मुलानं आईला दोन पुडे घ्यायला लावले आणि एक त्या माणसाच्या हातात दिला, त्यांच्या बाळासाठी…! अनेकदा लहान मुलं अशी काही व्यक्त होतात की, ती लहान आहेत यावर विश्वासच बसत नाही. 

रस्त्यावरून जाताना कुठं एखादा अपघात झालेला दिसला की, मोठी माणसं नुसतंच पाहून निघून जातात किंवा कित्येकजण तर बघतही नाहीत. पण लहान मुलं “आपण त्या काकांना डॉक्टरांकडे घेऊन जाऊया” म्हणून मागं लागतात. आणि आपण मात्र ‘कुठं ही नसती उठाठेव करा आणि ब्याद मागं लावून घ्या’ असं स्वतःशीच म्हणत पुढं निघून जातो. 

मुलांना नुसतं “सॉरी, थँक यू किंवा एक्सक्यूज मी” एवढं म्हणायला शिकवणं म्हणजे सामाजिक शिष्टाचार शिकवणं नसतं. माणूस म्हणून जगावं कसं, हे त्यांना प्रत्यक्ष आचरणातून शिकवावं लागतं. मुलांची भावनिक बुद्धिमत्ता लहान वयात फार उत्तम असते. त्यामुळं, आपल्या आचरणातला फोलपणा, दुटप्पीपणा, ढोंगीपणा मुलं लगेच व्यवस्थित ओळखतात. आपले आईवडील आपल्याला शिकवताना वेगळं शिकवतात आणि स्वतः वागताना मात्र वेगळंच वागतात, हे मुलांना पटकन समजतं. 

ज्या मुलाला रस्त्यावरच्या कुत्र्याच्या पिल्लाला भूक लागली आहे हे समजतं, त्याला काहीतरी खाऊ घालावं असं त्याला वाटतं, त्या पिल्लाला आपण घरी घेऊन यावं असं वाटतं, त्या मुलाला ‘काहीच समजत नाही’ असं कसं म्हणावं? उलट त्यांनाच खरं तर जे समजायला हवं ते नेमकं समजत असतं. 

कितीतरी गोष्टी मुलांना आवडत नाहीत. त्यांना सिगारेट ओढणारी माणसं आवडत नाहीत, रस्त्यांवर पचापच थुंकणारी माणसं किंवा घाणेरड्या शिव्या देणारी माणसं आवडत नाहीत. शू किंवा शी लागली की रस्त्यातच भिंतीशी जाणं तर त्यांना अजिबातच आवडत नाही. पण तरीही हे सगळं आपण एक समाज म्हणून त्यांना स्विकारायला लावतो. हे आपलं चुकत नाही का? 

मुलांचे डोळे आणि कान अत्यंत तीक्ष्ण असतात आणि सदैव तत्पर असतात हे सगळ्या समाजानंच कायमचं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. समाजातल्या एकाही मुलावर चुकीच्या गोष्टींचा प्रभाव पडता कामा नये, उलटपक्षी त्यांच्या जडणघडणीसाठी सर्वार्थाने उत्तम सामाजिक वातावरण आपण राखलंच पाहिजे, ह्या जाणिवेची आवश्यकता आहे. आणि आपण आपल्या मुलांना योग्य ते सामाजिक वातावरण देण्यात अपयशी ठरत आहोत हीच वस्तुस्थिती आहे. 

काही दिवसांपूर्वीच माझ्या शेजारच्या मुलानं त्याच्या शिक्षिका असणाऱ्या बाईंचे बिकिनी मधले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेले मला दाखवले होते. त्यात एका फोटोत तर त्या बाईंच्या हातात भरलेला ग्लास देखील होता. स्वतःचे बिकिनी घातलेले आणि दारू पितानाचे फोटो सोशल मिडियावर पोस्ट करण्याची इतकी हौस असणाऱ्या बाईंनी प्राथमिक शिक्षिका होऊच नये असं मला प्रामाणिकपणे वाटलं. त्यांनी मॉडेलिंगच करायला हवं. 

इतकंच काय, मी स्वतःसुद्धा अनेक शिक्षकांना समाजात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करताना, मद्यपान करताना पाहिलेलं आहे. कित्येक शिक्षकांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर विचित्र पोस्ट पाहिल्या आहेत. विविध ऐतिहासिक ठिकाणी, गडकोटांवर मुलांच्या सहली घेऊन आलेल्या कितीतरी महिला शिक्षिकांना तोकड्या कपड्यात पाहण्याची वेळ आली आहे. हे सगळं मुलांवर कोणते प्रभाव पाडणार आहे, याची जाणीव माणसांना नसते का? असा प्रश्न पडतो. 

ऐन वसुबारसेच्या संध्याकाळी आम्ही सवत्स धेनू पूजा करून येत असताना, माझे दोन-तीन वर्गमित्र सहकुटुंब – सहपरिवार (मुलाबाळांसकट) कारमध्ये होते. तिघेही आपापल्या क्षेत्रात उत्तम काम करत आहेत. उच्च पदस्थ आहेत, यशस्वी आहेत. त्यांच्यातला एक जण तर नामांकित विधिज्ञ आहे.

माझ्या गाडीपुढेच त्यांची गाडी होती. एका वाईन शॉप बाहेर त्यांनी गाडी थांबवली, दोघे जण गाडीतून उतरले आणि दारूच्या बाटल्या घेऊन आले, गाडी निघून गेली. बायका मुलांसह एकत्र असताना दारू कशाला हवी? मला खेदाचा धक्का बसला. एक क्षणभर मी मनातून हादरून गेलो. ऐन दिवाळीच्या दिवशी दारू का हवी? कुटुंबं बदलतायत आणि खरोखरच चुकीच्या पद्धतीने बदलतायत, हे फार प्रकर्षानं जाणवलं. 

पालकमित्रांनो, आपल्या देशाच्या प्रथम नागरिक असलेल्या महिला राष्ट्रपती कशा राहतात, कशा वागतात, कशा बोलतात, त्यांची जीवनशैली कशी आहे, हे तरी पहा. त्यांनी स्वतः शिक्षिका म्हणून काम केलं आहे, हे लक्षात घ्या. एकूण काय, आपल्याला खूप बदलावं लागेल. निदान पुढच्या पिढ्यांच्या उत्तम जडणघडणीसाठी तरी आपल्याला बदलावंच लागेल.. 

आपला समाज ज्या इंजिनावर चालतो ना, त्यातलं इंजिन ऑईल म्हणजे आपली मनं आहेत. ती जितकी स्वच्छ असतील तितकं इंजिन व्यवस्थित चालेल. ती जितकी उत्तम असतील, तितकं इंजिनाचं स्वास्थ्य उत्तम राहील आणि ती जितकी सकारात्मक प्रभावी असतील तितकी त्या इंजिनाला सकारात्मक गती येईल.. 

म्हणून, समाजाच्या इंजिनातलं इंजिन ऑईल बदला मित्रहो.. नाहीतर एके दिवशी ते इंजिन कायमचं बिघडून बसेल…

(आवडल्यास लेखात कुठलाही बदल न करता मूळ लेखकाच्या नावासहच शेअर करा ही विनंती.)

लेखक :  श्री मयुरेश उमाकांत डंके

मानस तज्ज्ञ, संचालक- प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

प्रस्तुती : मेघ:श्याम सोनावणे . 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ काव्य भास्कर ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ काव्य भास्कर ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

वाचनाचे विविध फायदे आहेत. ह्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील माहिती होऊन ज्ञानात भर पडते. वाचनामुळे वाडःमय, साहित्य अशा नानाविध प्रकारांची गोडी लागून एक प्रकारची समृद्धी येते. आणि ही लाभलेली श्रीमंती वा लाभलेलं समाधान पण काही ओरच असतं बरं का.

वाचनाच्या साहित्याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत.त्यापैकी कमी शब्दांत उच्च कोटीच्या भावना जागवणारं माध्यम म्हणजे काव्य , कविता. कविता करतांना आपल्या मनातील वा आपल्याला अपेक्षित असणारा संपूर्ण आशय हा अगदी मोजक्या शब्दांत रसिकांपर्यंत पोहोचवायचा असतो.ही कामगिरी खरोखरीच कसोटीची बरं.त्यामुळे गीत रचयितांना,कविंना मानाचा मुजरा.

आपल्याकडे एकसे बढकर एक काव्य रचयिते होऊन गेलेत आणि सध्या सुद्धा आहेत. ह्या होऊन गेलेल्या कविंमध्ये एक अजरामर नाव म्हणजे भा.रा.तांबे ह्यांचं. तिन्ही सांजा सखे मिळाल्या’, ‘घन तमी शुक्र बघ राज्य करी’, ‘कशी काळनागिणी, सखे ग, वैरीण झाली नदी’, ‘कळा ज्या लागल्या जिवा’, ‘मावळत्या दिनकरा’, ‘जन पळभर म्हणतील’ यांसारखी एकाहून एक सुमधुर भावगीतं रचून मराठी काव्य समृद्ध आणि श्रीमंत करणारे राजकवी भा. रा. तांबे यांचा २७ ऑक्टोबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने हा आठवणींचा कप्पा परत एकदा उलगडतोयं.

खरतरं काव्य करणारे हातं,मनं,डोळे हे सरसकट  फक्त आणि फक्त भावनिक क्षेत्रात आढळतात. पण ही समजूत कशी चूकीची आहे हेच जणू ह्या राजकवींनी सिद्ध केलयं. ह्यांची कामकाजाची ठिकाणं आणि हुद्दे म्हणजे हे  संस्थानी वकील, दिवाण, न्यायाधीश, सुपरिटेंडंट अशा रुक्ष नोकऱ्या करीत होते आणि ह्या रूक्ष क्षेत्रात एकीकडे कार्यरत राहून एकीकडे मात्र स्वत्ःमधील कोवळं मनं,कविमनं ह्यांनी निगुतीने जपलं.आणि एकाहून एक सरस अशा गोड कविता आणि गाणी ह्यांनी सहजतेने रचल्यात. त्यांनी एकीकडे ‘पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, वारा नेई सोने वाटे वाहुनिया दूर’ ह्यासारखी  निसर्गकविता, ‘तुझ्या गळा माझ्या गळा’सारखं बहीणभावाचं खेळीमेळीचं नातं वर्णन करणारं गीत, ‘या बालांनो सारे या, लवकर भरभर सारे या’सारखी बालकविता आणि त्याच सहजतेने ‘डोळे हे जुल्मी गडे रोखून मज पाहू नका’ अशी एका प्रेयसीची लोभस विनवणीही त्यांचीच देणं. ‘नववधू प्रिया मी बावरते’ अशी नवपरिणित तरुणीची घालमेलही ते एकीकडे मांडतात आणि दुसरीकडे ‘जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय?’सारखं जीवनातलं कटू सत्य सांगणारं गीतसुद्धा लिहून जातात.

भा.रा.तांबे यांनी १९२६ सालच्या मध्य भारतीय कविसंमेलनाचं आणि १९३२ सालच्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या कविसंमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. प्रणयप्रभा, तांबे यांची समग्र कविता अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. सात डिसेंबर १९४१ रोजी ग्वाल्हेरमध्ये त्यांचं निधन झालं.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माझ्या नजरेतून बदलती दुबई – भाग – १ ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ माझ्या नजरेतून बदलती दुबई – भाग – १ ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

दुबईसंबंधी लिहिताना मला काही त्या देशाचा राजकीय, ऐतिहासिक किंवा सामाजिक विषय डोळ्यासमोर नाहीये, पण गेल्या दहा बारा वर्षात मी जशी बदलत गेलेली दुबई बघितली आहे, त्यासंबंधी थोडक्यात लिहावसं वाटतंय !

२००६ मध्ये माझ्या जावयांनी जेव्हा दुबईमध्ये एमिराईट्स एअरवेज जॉईन करायचे ठरवले तेव्हा ‘अरेच्चा, दुबई?’ अशी प्रश्नचिन्हांकित झाले होते मी ! कारण तोपर्यंत बरेच तरुण शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी अमेरिका, इंग्लंड, युरोप किंवा फार तर ऑस्ट्रेलियात जातात हेच माहिती ! पण अमेरिका, सिंगापूर खालोखाल ‘ एमिराईट्स एअरवेज’ अतिशय चांगली एअरवेज कंपनी आहे हे तेव्हा मला कळलं, आणि लगेचच त्यानंतर २००७ मध्ये आमची पहिली दुबई ट्रिप झाली !

तेव्हाचे दुबईचे वर्णन ‘दुबई मुंबई सारखीच आहे’ इतपतच माहीत होते. पण दुबईच्या एअरपोर्टवर प्रथम उतरल्यावर मनाला भावले ते येथील स्वच्छ, मोठे रस्ते आणि जागोजागी दिसणारे फुलांचे ताटवे, कारंजी ! इथे पाणी नाही अशी एक कल्पना होती, पण इथे तर पाण्याचा काहीच दुष्काळ नव्हता ! माझी मुलगी रहात होती तो ‘बर् दुबई’ भाग मुंबईसारखाच मध्यम उंचीच्या इमारतीने भरलेला असा होता. पहिल्या फेरीतच आम्ही दुबईचे मंदिर आणि म्युझियम पाहिले. दुबईमध्ये फिरताना लक्षात आले की  दुबईमध्ये शीख, गुजराथी, उत्तर प्रदेशी, तमिळ आणि केरळ या भागातील लोकांची संख्या जास्त प्रमाणात आहे. म्युझियममध्ये दुबईचा इतिहास कळला. साधारणपणे १९७० सालानंतर दुबई पृथ्वीच्या गोलावर ठळकपणे दिसू लागले. प्रथम टोळ्याटोळ्यांनी राहणाऱ्या लोकांनी कुवेत, शारजा, अबुधाबी, सौदी अशी छोटी छोटी मुस्लिम राज्य निर्माण केली ! तसेच हे दुबई ! दुबई,अबुधाबी,शारजा,अजमान,फुजेराह,रस् अल् खैमा,उमल् क्वेन, असे संयुक्त अमिरातीचे सात भाग आहेत. 

खाडी किनाऱ्यावर फिरल्यावर असे लक्षात आले की इथला व्यापार मोठ्या जहाजामार्फत चालत असे. मोती, मासे आणि मुख्य म्हणजे सोन्याची मुक्त बाजारपेठ यामुळे दुबई हे मोक्याचे ठिकाण होते. अनेक कन्स्ट्रक्शन कंपन्या येत असल्याने इंजिनियर्स आणि वर्कर्स दोन्हींचे येणे वाढले होते.

दुबईमध्ये पाणी मुबलक होते. लाईट कधी जात नसत. इन्फ्रास्ट्रक्चर चांगले होते आणि शिस्तबद्ध, सर्व सुख सोयींनी युक्त असे तेथील जीवन होते. अमेरिकेसारख्याच सुखसोई! पण येथे सर्वात विशेष काय होते तर कामाला, स्वयंपाकाला माणसे मिळत असत ! ते सौख्य अमेरिकेत महाग असते !

२००७ ते २०१० ही  तीन वर्षे आम्ही दुबईमध्ये दरवर्षी येत होतो, कारण माझा नातू तेव्हा लहान होता. मुलीचा जॉब होता, घरी कामाची बाई होती, तरीही घरचं माणूस आवश्यक वाटत असे.

त्यावेळी ‘ बुर्ज अल् अरब ‘ ही मोठ्या जहाजाच्या आकाराची बिल्डिंग समुद्रातच नव्याने बांधलेली होती. ती आम्हाला अर्थातच खूप आकर्षक वाटली. एस्केलेटर्स,मोठमोठे मॉल फिरताना खूप मजा वाटत होती.

२००८ च्या मुक्कामात मेट्रोचे काम जोरात चालू होते.९-९-२००९– मेट्रो चालू करण्याचा संकल्प खरोखरच त्यावर्षी पूर्ण झाला ! डिसेंबर ते फेब्रुवारी दुबई शॉपिंग फेस्टिवल असे. बऱ्याच जवळच्या देशातील लोक फिरायला, खरेदी करायला येथे येत असतात. त्या काळात रात्री साडेआठ वाजता क्रिकवर फायर फेस्टिवल होई. दिवाळीप्रमाणे तऱ्हेतऱ्हेचे, रंग रूपाचे फटाके साधारणपणे दोन तीन मिनिटं सलगपणे उडवले जात. त्यांचे रंग आणि पाण्यात पडणारे प्रतिबिंब दोन्हीही विलोभनीय दिसत असे !

तिथे असणाऱ्या काही मराठी कुटुंबांबरोबर मैत्री झाल्यामुळे आम्ही सर्वजण मिळून  ‘अलेन’ची ट्रीप केली. तेथील झू फारच प्रेक्षणीय होते. वाघ,सिंह,जिराफ,यासारखे प्राणीही, वाळवंटी प्रदेशात असूनही खूपच चांगले राखले होते.जबेल हफित अलेन मधील एक उंच डोंगर ! खूप उंच नव्हता, पण सपाट पसरलेल्या वाळवंटात तो  जास्त उंच वाटत होता.   एक दिवस ‘ गोल्ड सुक् ‘ पहायला गेलो. ते पहाणे म्हणजे डोळ्यांना सुख देणे असे वाटले !– तुळशीबागेसारखा मोठा बाजार ! दुतर्फा सोन्याने भरलेली दुकाने, सोन्याच्या माळा, मोठमोठे दागिने, आणि दारात उभे राहून बोलावणारे दुकानदार लोक! बघूनच डोळे तृप्त झाले. एवढे सोने तिथे दिसत होते पण आपल्या खिशातले पैसे तिथले काय खरेदी करू शकणार या विचारानेच आम्ही दृष्टी सुख घेऊन परत आलो. तिथून जवळच खास मसाल्याचा (स्पाइस सुक्) बाजार होता. तिथे मात्र लवंग, दालचिनी, मिरे, तमालपत्र  यासारख्या पदार्थांचे ढीग लागलेले होते. तसेच केशरही बऱ्यापैकी स्वस्त होते. आम्ही या पदार्थांची थोडीफार खरेदी केली.

— भाग पहिला 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प, भाग -४१  परिव्राजक १९.  कन्याकुमारी ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प, भाग -४१  परिव्राजक १९.  कन्याकुमारी डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

स्वामीजी धारवाड, बंगलोर करत करत म्हैसूरला आले. म्हैसूर संस्थांचे दिवाण सर के. शेषाद्री अय्यर यांच्याकडे स्वामीजी राहिले होते. त्यांनी म्हैसूर संस्थानचे महाराज चामराजेंद्र वडियार यांचा परिचय करून दिल्यानंतर त्यांनी स्वामीजींना संस्थानचे खास अतिथि म्हणून राजवाड्यावर ठेऊन घेतले. एव्हढी सत्ता आणि वैभव असलेल्या या तरुण महाराजांना धर्म व तत्वज्ञान याविषयी आस्था होती. म्हैसूर हे भारतातील सर्वात मोठ्या संस्थांनांपैकी एक होते. इथे अनेक विषयांवर स्वामीजी बरोबर चर्चा आणि संवाद घडून येत.

महाराजांशी स्वामीजींचे चांगले निकटचे संबंध निर्माण झाले होते. त्यांनी एकदा स्वामीजींना विचारलं स्वामीजी मी आपल्यासाठी काय करावं ? त्यावर तासभर झालेल्या चर्चेत स्वामीजी म्हणाले, “भारताचा अध्यात्म विचार पाश्चात्य देशात पोहोचला पाहिजे आणि भारताने पाश्चात्यांकडून त्यांचे विज्ञान घेतले पाहिजे. आपल्या समजतील सर्वात खालच्या थरापर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे आणि धर्माची खरी तत्वे सामान्य माणसाला समजून सांगितली पाहिजेत. शिकागोला जाण्याचा विचार ही त्यांनी बोलून दाखवला होता, यावर महाराजांनी आवश्यक ती सर्व मदत तत्काळ करण्याची तयारी दाखवली होती पण, स्वामीजींनी प्रत्येक वेळेसारखा इथेही नकार दिलेला दिसतो. तरीही महाराजांनी स्वामीजींनी त्यांच्या आवडीची भेटवस्तू आमच्या कडून घ्यावी याचा खूप आग्रह केला आणि बाजारात कारकूनाबरोबर एक हजार रुपये देऊन स्वामीजींबरोबर पाठविले. त्यामुळे स्वामीजी त्यांच्या कौतुकासाठी सर्व बाजार फिरले आणि त्यांना बरं वाटावं म्हणून एक सर्वात उत्तम सिगारेट घेतली. ती एक रुपयाची होती. ती तिथेच ओढून संपवली. असे हे निरिच्छ वृत्तीचे स्वामीजी राजेरजवाड्यात पाहुणचार घेत ठिकठिकाणी राहिले होते पण, तेंव्हाही त्यांच्या डोळ्यासमोर खेडोपाड्यातली दरिद्री जनता आणि राज्यकर्त्याकडून दीन दुबळ्या प्रजेचे काहीतरी कल्याण होईल एव्हढाच विचार असायचा. क्वचित एखादाच राजा हे करू शकतो असा त्यांचा अनुभव होता. त्यातलेच हे म्हैसूरचे महाराज होते.

त्यांना स्वामीजींनी शिकागोहून पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे “हे उदार महाराजा, मानवाचे जीवन फार अल्पकालीन आहे आणि या जगात हव्याशा वाटणार्‍या सुखाच्या गोष्टी केवळ क्षणभंगुर आहेत. पण जे इतरांसाठी जगतात तेच खर्‍या अर्थाने जगतात. भारतातील तुमच्यासारखा एखादा सत्ताधीश जर मनात आणेल, तर तो या देशाला आपल्या पायावर उभे करण्यासाठी महान कार्य करू शकेल. त्याचे नाव पुढच्या पिढ्यांत पोहोचेल आणि जनता अशा राजाबद्दल पूज्यभाव धरण करेल”. यावरून स्वामीजीं स्वत:साठी काहीही मागत नसत. महाराजांनी स्वामीजींची पाद्यपूजा कराची इच्छा व्यक्त केली तर त्यांनी स्पष्ट नकार दिला. शेवटी त्यांनी स्वामीजींचा आवाज एखादी आठवण म्हणून ध्वनीमुद्रित करून द्यावा अशी कल्पक मागणी केली. त्याला होकार दिला आणि त्या वेळच्या फोनोग्रामच्या तबकडीवर चार पाच मिनिटांचे बोलणे रेकॉर्ड करून घेतले. बर्‍याच वर्षांनंतर तो पुसट झाला. मग महाराजांचा निरोप घेऊन स्वामीजी केरळ प्रदेशात गेले.

त्रिचुर, कोडंगल्लूर,एर्नाकुलम, कोचीन इथे फिरले. केरळ, मलबार या भागातल्या जुनाट चालीरीती आणि ख्रिस्त धर्मी मिशनर्‍यांचा तिथे चाललेला धर्मप्रचार या गोष्टी स्वामीजींच्या लक्षात आल्या होत्या. त्यामुळे त्यांना वाटलं की हिंदू धर्माच्या दृष्टीने ही गोष्ट चांगली नाही. स्वामीजींना उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतात आलेले अनुभव वेगळे होते. त्यांच्या लक्षात आले की, दक्षिणेत पाद्री लोक खालच्या वर्गातील लाखो हिंदूंना ख्रिस्त धर्मात घेत आहेत. जवळ जवळ एक चतुर्थांश लोक ख्रिस्त धर्मात गेले आहेत.

(असा स्पष्ट उल्लेख स्वामीजींच्या चरित्र ग्रंथात आहे).

कोचीनहून स्वामीजी त्रिवेंद्रमला आले. एर्नाकुलम पासून त्रिवेंद्रम सव्वा दोनशे किलोमीटर अंतरावर, बैलगाडी आणि पायी प्रवास करताना केरळचं निसर्ग वैभव त्यांना साथ करत होतं. आंबा, फणस, नारळ यांची घनदाट झाडी, लहान मोठ्या खाड्या, पक्षांचे मधुर आवाज असा रमणीय रस्ता स्वामीजी चालत होते.

त्रिवेंद्रमला स्वामीजी सुंदरराम यांच्याकडे राहत असताना घरातील लहान, मोठे, नोकर, चाकर यांच्याशी पण मनमोकळे बोलत असत. एकदा, सुंदरराम यांचा चौदा वर्षांचा मुलगा रामस्वामी याला स्वामीजी म्हणाले, “तू अगदी तरुण आहेस,लहान आहेस. माझी फार इच्छा आहे की तू कधीतरी उपनिषदं, ब्रह्मसूत्रे, भगवद्गीता यांचा निष्ठापूर्वक अभ्यास कर. या तिन्हीना मिळून प्रस्थानत्रयी म्हणतात. त्याच बरोबर इतिहास पुराणाचा पण अभ्यास कर. या तोलामोलाचे ग्रंथ तुला सार्‍या जगात दुसरीकडे कुठेही मिळणार नाहीत. कोणतीही गोष्ट कशामुळे निर्माण झाली, तिचं पर्यवसान कशात होणार, ती का अस्तित्वात आली आणि तिची दिशा कोणती? हे जाणून घेण्याची जिज्ञासा केवळ मानवप्राण्यातच असू शकते तिचा पूर्ण उपयोग करून घे”.

कन्याकुमारी भारत वर्षाच्या दक्षिणेचे शेवटचे टोक. त्रिवेंद्रम हून नव्वद किलोमीटर. डिसेंबरला त्रिवेंद्रमहून स्वामीजी निघाले आणि कन्याकुमारीला पोहोचले. संपूर्ण वंदेमातरम  या गीतातलं मातृभूमीचं वर्णन स्वामीजींनी ऐन तारुण्यात ऐकलं होतं. याच वर्णनाचा भारत देश स्वामीजींनी पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे हजारो किलोमीटर प्रवास करून पालथा घातला होता. डोळ्यात साठवून ठेवला होता. अशी ही स्वदेशाची आगळीवेगळी यात्रा  करायला त्यांना अडीच वर्ष लागली होती. कन्याकुमारीच्या आपल्या मातृभूमीच्या दक्षिण टोकावरच्या खळाळत्या लाटांच्या हिंदुमहासागराला ते भेटणार होते आणि या अथांग सागराला वंदन करून आपल्या विराट भ्रमणाची पूर्तता करणार होते.

स्वामीजींनी दक्षिणेश्वरच्या मंदिरातील कालीमातेचं/जगन्मातेचं दर्शन घेऊन परिव्राजक म्हणून प्रवास सुरू केला तो आता कन्याकुमारी मंदिराच्या दर्शनाने संपणार होता.

या मंदिरात स्वामीजी गेले आणि कन्यारूपातील जगन्मातेचं दर्शन घेऊन बाहेर आले. तशी समोर लांबवर नजर गेली, दीड फर्लांग अंतरावर दोन प्रचंड शिलाखंड दिसले. आपल्याच भूमीवरच्या या शिलाखंडावर जायची त्यांना मनोमन इच्छा झाली. तिथे गेलो तर खर्‍या अर्थाने मातृभूमीचे दक्षिण टोक आपण गाठले असा अर्थ होईल. म्हणून कसही करून त्या खडकांवर आपण जाव असं वाटून ते किनार्‍यावर आले. जवळच होड्या होत्या. काही कोळी पण उभे होते. स्वामीजींनी चौकशी केली. त्या नावेतून खडकापर्यंत पोहोचविण्यास नावाडी तयार होते, फक्त पैसे द्यावे लागणार होते. स्वामीजी तर निष्कांचन होते. एक पैसा सुद्धा जवळ नव्हता. झळ त्यांनी त्या उंच लाटांमध्ये उडी घेतली पोहत पोहत जाऊन ते खडक गाठले. समुद्राला रोजचे सरावलेले असतांनाही नावाडी स्तब्धच झाले. लाटा उसळणार्‍या तर होत्याच पण तिथे शार्क माशांपासून पण धोका होता हे त्यांना माहिती होतं. हे पाहून दोन तीन नावाडी पाठोपाठ गेले. सुखरूप पोहोचले हे बघून, त्यांना काही हवे का विचारले. आम्ही आणून देऊ असे सांगीतल्यावर थोडे दूध आणि काही शहाळी पुरेशी आहेत असे स्वामीजींनी सांगितले. स्वामीजी या शिलाखंडावर तीन दिवस, तीन रात्र राहिले.ते दिवस होते 25,26,27 डिसेंबर 1892

लाटांच्या अखंड गंभीर नादाबरोबर स्वामीजींचे चिंतन सुरू झाले. कलकत्त्यातून बाहेर पडल्यापासुनचे सर्व दिवस, त्यात आलेले अनुभव, सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं होतं. जगन्मातेचं ध्यान आणि भारत मातेचं चिंतन तीन दिवसात झालं.

प्रश्नचिन्ह – प्राचीन इतिहास असलेला हा विशाल देश, इतिहासाचे केव्हढे चढउतार, सार्‍या जगाला हेवा वाटेल असे प्राचीन काळातील द्रष्ट्या ऋषीमुनींनी दिलेले आध्यात्मिक धन. पण तरीही आज भारत कसा आहे? त्याची अस्मिताच हरवलेली दिसत आहे. सगळ्या मानव जातीने स्वीकारावीत अशी शाश्वत मूल्यं पूर्वजांकडून लाभली आहेत तरीही त्यातल्या तत्वांचा त्याला विसर पडला आहे. अभिमान वाटावा असं भूतकाळाचा वारसा आहे पण वर्तमानात मात्र घोर दुर्दशा आहे. यातून समाजाचं तेज पुनः कसं प्रकाशात आणता येईल?  अशा प्रश्नांची उत्तरे त्यांना शोधायची होती. उपाय शोधायचे होते.

आपल्या समाजातील अज्ञान आणि दारिद्र्य दूर कसे होईल आणि भारताचे पुनरुत्थान कसे होईल?त्याच्या आत्म्याला जाग कशी येणार? याच प्रश्नावर जास्त वेळ चिंतन करत होते.

प्राचीन ऋषीमुनींनी दिलेले उदात्त आध्यात्मिक विचार आणि जीवनाची श्रेष्ठ मूल्ये खालच्या थरातील माणसांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे असे त्यांना तीव्रतेने वाटत होते. सामान्य माणसाच्या सेवेसाठी आणी उन्नतीसाठी आपण प्रयत्न करायचा असा स्वामीजींचा निर्णय झाला. हे करण्यासाठी पाच दहा माणसं आणि पैसा हवाच. पण या दरिद्री देशात पैसे कुठून मिळणार? त्यांना आलेल्या अनुभवा नुसार धनवान मंडळी उदार नव्हती. आता अमेरिकेत सर्वधर्म परिषद भरते आहे. तिथे जाऊन त्यांना भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीचा परिचय करून द्यावा आणि तिकडून पैसा गोळा करून आणून इथे आपल्या कामाची ऊभारणी करावी. आता उरलेले आयुष्य भारतातल्या दीन दलितांच्या सेवेसाठी घालवायचे असा संकल्प स्वामीजींनी केला आणि शिलाखंडावरून  ते परतले. तीन दिवस तीन रात्रीच्या चिंतनातून प्रश्नाचं उत्तर स्वामीजींना मिळालं होतं.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महिना अखेरचे पान – 10 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

महिना अखेरचे पान – 10 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

सांगावसं वाटलं म्हणून….10

अश्विन शुद्ध एक म्हणजे घटस्थापना!कधी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीला सुरू होणारा तर कधी ऑक्टोबर महिन्यात सुरू होणारा अश्विन महिना घेऊन येतो नवरात्रोत्सव आणि जाता जाता दीपोत्सव देऊन जातो.

घटस्थापनेला घटांची स्थापना केली जाते. शारदीय नवरात्रीला प्रारंभ होतो. ललितापंचमी, दुर्गाष्टमी, खंडेनवमी असे एक एक दिवस साजरे होत असतात. नऊ दिवसांचे, नव्हे नव्हे नऊ रात्रींचे, नवरात्र संपते आणि विजयादशमीचा दिवस उजाडतो.विजयादशमी म्हणजेच दसरा,दशहरा!असूरीय वृत्तींचा वध करून सत्प्रवृत्तींचा विजय साजरा करण्याचा दिवस.पारंपारिक सीमोलंघनाबरोबरच वैचारिक सीमोलंघन करण्याचा दिवस. अन्यायाचा प्रतिकार करून मानवतेचा संदेश पसरवण्यासाठी मानवी मनाचे परिवर्तन करण्याचा दिवस!नवरात्रीतील लक्ष लक्ष दीपज्योतीच सांगत असतात आता तमाचा नाश फार दूर नाही. या दीपाप्रमाणेच आकाशातील पूर्णचंद्राचा दीपही उजाळून निघतो आणि को जागरती,कोण कोण जागे आहे हे पाहण्यासाठी अश्विन पौर्णिमेला सहस्त्ररश्मी तेजाने उजळून निघालेला असतो.आकाशाचा तो नीलमंडप जणू काही मोग-याच्या फुलांनी बहरून जावा असा फुललेला असतो. चांदण्याची ही फुले प्रत्येक क्षण उल्हसित करत असतात. जणू काही ही पुढच्या आनंदमयी दिवसांची सुरूवातच असते.

अश्विनातील अमावस्येचा अंधःकार विरत जातो आणि कार्तिकातील पहिल्या पहाटेच घरोघरी दारापुढे पणत्यांच्या मंद ज्योती प्रकाशाचा निरोप घेऊन येतात. कधी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात तर कधी नोव्हेंबरच्या सुरूवातीला सुरू होणारा हा प्रकाशोत्सव म्हणजेच दीपावली! दिवाळी. आनंद, उत्साह, तेज घेऊन येणारा हा सण. गोवत्स द्वादशी म्हणजेच वसूबारस, गुरूद्वादशी, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशीला अभ्यंगस्नान,  लक्ष्मीचे पूजन करून समृद्धी आणि संपन्नता मिळावी म्हणून प्रार्थना करण्याचा लक्ष्मीपूजनाचा दिवस!. त्यानंतर येणारा, नवे व्यावसायिक वर्ष सुरू करणारा  आणि पती पत्नीतील प्रेम आणि विश्वास दृढ करणारा दिवाळी पाडव्याचा दिवस. दिवाळीतील पाडव्यालाच विक्रम संवत व महावीर जैन संवत या नववर्षांचा प्रारंभ होत असतो. 

भाऊ आणि बहिण यांच्यातील स्नेहाच्या मोत्यांच्या माळा गुंफणारी भाऊबीज. दीपांच्या मालिकांप्रमाणे एका मागोमाग एक  येणा-या या मंगलमयी दिवसांमुळे दीपावलीचे हे  पर्व सर्वत्र चैतन्य पसरवित जाते. नवे कपडे, भेट वस्तू, नवी खरेदी, फराळाच्या पदार्थांनी भरलेली ताटे, आतषबाजी, रोषणाई या सगळ्याची लयलूट करणारा हा दिवाळीचा सण मनाला एक वेगळीच उर्जा देऊन जातो.

हा ऑक्टोबर महिना अन्य काही कारणांसाठी लक्षात राहणारा असतो. महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती असते.तर हाच दिवस अर्थशास्त्रज्ञ, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर, पहिले अर्थमंत्री व साहित्यिक श्री.चिंतामणराव देशमुख यांचा हा स्मृतीदिन. याच ऑक्टोबर महिन्यातील दसरा  हा क्रांतीकारक सीमोलंघन करणारा ठरला तो धम्मचक्र प्रवर्तनामुळे. तर दुसरीकडे ईद-ए-मिलाद मुळे मुस्लिम धर्मियांसाठीही हा महिना तितकाच महत्त्वाचा.

जागतिक स्तरावर एक ऑक्टोबर हा दिवस ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून पाळला जातोच पण त्याशिवाय तो काॅफी दिन, संगीत दिन आणि रक्तदान दिनही आहे. पाच ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिन व सात ऑक्टोबर हा जागतिक वन्य पशू दिन आहे. आठ ऑक्टोबर हा भारतीय हवाई दल दिन म्हणून साजरा केला जातो.जागतिक टपाल दिन नऊ ऑक्टोबरला तर दहा ऑक्टोबरला राष्ट्रीय टपाल दिन पाळून टपाल खाते व कर्मचारी यांच्या कार्याची दखल घेतली जाते. अंधांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधून त्यांना मदत करण्यासाठी पंधरा ऑक्टोबर हा अंध सहायता दिन म्हणून पाळला जातो.जागतिक पोलिओ दिन चोवीस ऑक्टोबरला असतो तर तीस ऑक्टोबरला  बचत दिन साजरा करून बचतीकडे लक्ष वेधले जाते. एकतीस ऑक्टोबर या दिवशी भारतात राष्ट्रीय एकता दिवस  पाळला जातो.

याच महिन्यात महर्षि वाल्मिकी, श्री जलाराम तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असते; तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व राजे यशवंतराव होळकर यांची पुण्यतिथि ऑक्टोबर महिन्यातच येते.

सामाजिक, राजकीय, धार्मिक अशा विविध कारणांनी गजबजलेल्या या ऑक्टोबरच्या शेवटी शेवटी हवेतही बदल होत जातो. थंडीची चाहुल लागते. दिवाळीच्या सुट्ट्या संपत आलेल्या असतात. त्या संपण्यापूर्वी पर्यटनाला उत्सुक असणारे पर्यटक घराबाहेर पडत असतात. त्याच वेळेस निसर्ग एक पाऊल पुढे टाकून आपला प्रवास चालूच ठेवत असतो.व र्षा ऋतुला पूर्ण निरोप देऊन शरद आणि हेमंत ऋतुचा आल्हाददायक अनुभव घेण्यासाठी काळ पुढे पुढे सरकत असतो.एका नव्या महिन्यात प्रवेश करण्यासाठी !

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भूमिका…एक जगणे ! ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ भूमिका…एक जगणे ! ☆ श्री अरविंद लिमये ☆

भूमिका हा शब्द आणि विविध कलाकारांनी साकार केलेल्या,जिवंत केलेल्या असंख्य नाटके आणि चित्रपटांमधील  सकस भूमिका यांचं अतूट असं नातं आहे. या वाक्यात आलेले ‘साकार’, ‘विविध’ आणि ‘जिवंत’ या शब्दांचे अर्थरंग पूर्णतः समजून घेतल्याशिवाय ‘भूमिका’ या शब्दाचा सखोल वेध घेताच येणार नाही.

‘भूमिका’ या संदर्भात विचार करायचा तर भूमिका ‘साकार’ करण्यात त्या व्यक्तिरेखेला योग्य ‘आकार’ देणेच अपेक्षित आहे.’विविध’ हा शब्द इथे एखाद्या कलाकाराने भूमिकांद्वारे साकार केलेल्या व्यक्तिरेखांना उद्देशून आलेला असला तरी या ‘विविध’ शब्दात अंगभूत असणारे एखाद्या भूमिकेच्या संदर्भातले ‘वैविध्य’ही  कलाकाराने त्या व्यक्तिरेखेचा सखोल अभ्यास करून समजून घेणे आवश्यक असते. विशिष्ट भूमिका साकारत असताना त्या व्यक्तिरेखेची पूर्ण पार्श्वभूमी म्हणजे तिचे स्वरूप, स्वभावरंग, त्याच्या भोवतालची परिस्थिती, त्याचे वय, आर्थिक स्थिती, त्याची विचार करण्याची पद्धत आणि असं बरंच कांही असा त्या व्यक्तिरेखेचा सर्वांगाने केलेला अभ्यास ही त्या भूमिकेची अत्यावश्यक अशी पूर्वतयारी!नाटककाराने नाट्यसंहितेत केलेली व्यक्तिरेखेची बांधणी ही विशिष्ट ठिपक्यांच्या रांगोळीतील रेखाकृतीसारखी असते. दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांच्या सहाय्याने त्या व्यक्तिरेखेच्या रेखाकृती रांगोळीत रंग भरण्याचे काम नटाला करायचे असते. हे रंगभरण म्हणजेच अभिनयाद्वारे भूमिका ‘जिवंत’ करणे! नाट्यसंहितेत त्या भूमिकेचा आलेख विविध घटना, प्रसंग,संवादातून सूचित केलेला असतोच. ते सूचन आणि स्वतःचा अभ्यास याद्वारे दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली अभिनयाची अथपासून इतीपर्यंतची एक सलगरेषा नटाने आपल्या मनात ठळकपणे आखून ठेवायची असते. त्या सलगरेषेनुरुप रंगभूमीवर होणारी त्या भूमिकेची वाटचालच ती ‘भूमिका’ जिवंत करीत असते!

हे सगळं रंगभूमी किंवा चित्रपटातील भूमिकांबद्दलचे विवेचन आहे असेच वाटले ना?पण ते ‘फक्त’ तेवढेच नाहीय. कारण नाटक काय किंवा चित्रपट काय वास्तवाचा आभासच. त्यामुळेच त्या ‘आभासा’इतकंच हे विवेचन ज्या वास्तवाचा तो आभास त्या वास्तवालाही पूर्णतः लागू पडणारे आहेच!

रंगभूमीवरील वास्तवाचा आभास हा खरंतर जगण्याचाच आभास! तो आभास जितका परिपूर्ण तितक्या त्यातील भूमिका म्हणजेच संपूर्ण सादरीकरण जिवंत! भूमिका अशा जिवंत म्हणजेच वास्तव भासण्यासाठी जशी कलाकारांना आपापली भूमिका तिच्यातले बारकावे, खाचाखोचा, कंगोरे समजून घेऊन वठवावी लागते तसेच प्रत्यक्षात वेगवेगळ्या भूमिकांतून वावरताना आपल्यालासुध्दा त्या त्या वेळच्या भूमिकांच्या बाबतीत हे करावे लागतेच.

रंगभूमीवर क्वचित कांही अपवाद वगळता एका कलाकाराला एकच भूमिका पार पाडायची असते. पण ते करतानाही त्याच्या भूमिकेचे इतर भूमिकांशी असणारे संबंध, धागेदोरे,भावबंध,देणेघेणे,कर्तव्ये, जबाबदाऱ्या हे सगळं समजून घेऊनच त्याला आपली भूमिका साकार करायची असते. आपल्या आयुष्यात मात्र आपल्याला एकाच वेळी अनेक भूमिका वठवाव्या लागतात आणि त्या त्या वेळी इतरांच्या आपल्या भूमिकांशी असणारे संबंध, धागेदोरे,भावबंध, देणेघेणे, कर्तव्ये,जबाबदाऱ्या हे सगळं आपल्यालाही विचारात घ्यावे लागतेच.आपल्या या सगळ्याच भूमिका चांगल्या वठल्या तरच आपले जगणे कृतार्थ म्हणजेच खऱ्या अर्थाने जिवंत आणि त्या योग्य पद्धतीने नाही पार पाडता आल्या तर मात्र जगणं कंटाळवाणं, निरस आणि असमाधानी!

वास्तव जगण्यात आपल्या भूमिकांचे संवाद लिहायला कुणी लेखक नसतो. हालचाली बसवायलाही कुणी दिग्दर्शक नसतोच. नाटकातील घटना प्रसंग नाटककाराने नियत केलेले असतात आणि आपल्या आयुष्यातले घटना-प्रसंग नियतीने! तिथे नाटककाराने आपले संवाद चोख लिहिलेले असतात. आपल्या आयुष्यात मात्र काय बोलायचे हे आणि कसे बोलायचे हेही आपणच आपल्या बुद्धी आणि कुवतीनुसार ठरवायचे असते. तिथे दिग्दर्शक मार्गदर्शन करत असतो आणि इथे आपलेच अनुभव,आपण जोडलेली माणसे आणि त्या त्या वेळची परिस्थिती हे सगळे दिग्दर्शकासारखेच आपल्याला मार्ग दाखवत असतात. तिथे प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त टाळ्यांच्या रुपातल्या प्रतिक्रिया नटाच्या भूमिकेला दात देत असतात आणि इथे आपल्याला मिळणारे कर्तव्यपूर्तीचे समाधानच आपल्याला पुढील वाटचालीसाठी आवश्यक ती उमेद,उत्साह देत रहाते.

वास्तव आणि आभासातलं हे साम्य वरवरचं नाहीय. खरंतर भूमिका वास्तव जगण्यातल्या असोत वा आभासी जगातल्या त्या ‘भूमिका’ या शब्दाच्या मूळ अर्थांची प्रतिबिंबेच असतात.हे कसे हे ‘भूमिका’ या शब्दाचे मूळ अर्थच सांगतील.  

‘भूमिका’  म्हणजे जसा अभिनय, तसंच भूमिका म्हणजे पीठिका,पवित्रा,आणि अवस्थाही.  भूमिका म्हणजे पृथ्वी.भूमिका म्हणजे जमीन,भूमीही.आपल्या वास्तव आयुष्यातल्या भूमिका या जमिनीवर,भूमीवर  घट्ट पाय रोवूनच वठवत गेलो तरच त्या जिवंत वाटतात नाहीतर मग निर्जीव. आभासी जगातल्या भूमिका वठवताना ‘रंग’ही गरजेचे आणि भूमीसुध्दा!म्हणूनच त्या जिथे साकार करायच्या त्या भूमीला ‘रंगभूमी’ म्हणत असावेत!

भूमिका कोणतीही,कुठेही वठवायची असो ती मनापासून वठवायला हवी हे मात्र खरे!कारण ‘भूमिका’ म्हणजे असे एक जगणेच जर, तर ते अगदी मनापासूनच जगायला हवे ना?

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संस्कृत साहित्यातील   स्त्रिया… ☆ डॉ मेधा फणसळकर ☆

डॉ मेधा फणसळकर

? विविधा ?

☆ संस्कृत साहित्यातील   स्त्रिया…  ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

संस्कृत आणि स्त्री म्हटले की बऱ्याच जणांना ‛ न स्त्री स्वातंत्र्यमर्हति|’ हे वचन आठवते. अर्थात ते वेगळ्या संदर्भात म्हटले आहे. पण त्यावर चर्चा करण्याऐवजी या नवरात्रात संस्कृत साहित्यातील नऊ सशक्त स्त्रियांवर लिहायचा मी प्रयत्न करणार आहे.

वास्तविक कोणतेही साहित्य हा त्या त्या काळातील समाजमनाचा आरसा असतो. त्यामुळे अगदी वैदिक काळापासून विचार केला तर अनेक संदर्भ असे आढळतात की त्या काळी स्त्रिया स्वतंत्र विचारसरणीच्या होत्याच, शिवाय अनेक क्षेत्रातही सक्रिय होत्या. खेल राजाची पत्नी विश्पला हिने युद्धात आपले पाय गमावले होते. पण अश्विनीकुमारांनी शस्त्रक्रिया करून तिला वाचवले होते. असा उल्लेख ऋग्वेदात आहे. मुद्गलानी उत्तम धनुर्धारी होती. असाही उल्लेख आढळतो.

अनेक विद्वान स्त्रियाही त्या काळात पुरुषांच्या बरोबरीने चिंतन करत असत. त्यातीलच दोन स्त्रियांची आज आपण ओळख करून घेणार आहोत. स्त्रीशक्तीला माझ्याकडून हा अक्षरप्रणाम!

मैत्रेयी

मैत्रेयी ही याज्ञवल्क्य ऋषींची पत्नी! त्यांना कात्यायनी व मैत्रेयी अशा दोन पत्नी होत्या. त्यातील कात्यायनी ही त्यांचा संसार अतिशय उत्तम पद्धतीने सांभाळत होती. तर मैत्रेयीला तत्वज्ञानाची आवड होती. त्यामुळे तिला ब्रह्मवादिनी असे म्हटले जात असे.

एकदा ऋषींनी गृहस्थाश्रमाचा त्याग करून संन्यास घ्यायचे ठरवले. त्यामुळे दोन्ही पत्नीना जवळ बोलावून त्यांनी आपली इच्छा सांगितली व आपली जी काही मालमत्ता आहे ती दोघीत वाटून द्यायचे ठरवले. ते ऐकून मैत्रेयीने लगेच प्रश्न विचारला,“ या जीवनातील सर्वोच्च सुख म्हणजे संपत्ती का?” तिचा हा प्रश्न महर्षीना लगेच कळला आणि त्यांनी खरे सुख म्हणजे काय आणि आत्मतत्वाचा शोध कसा घ्यायचा याचे ज्ञान मैत्रेयीला दिले.

हा याज्ञवल्क्य- मैत्रेयी संवाद प्रसिद्ध आहे. ज्यांना तो जाणून घ्यायचा आहे त्यांना तो नेटवर सहज उपलब्ध होईल. पण यातील विदुषी असणारी मैत्रेयी हे त्या काळातील स्त्रीशक्तीचे, तिच्या प्रगल्भ विचारांचे आणि स्त्रीस्वातंत्र्याचे उत्तम उदाहरण होते असे मला वाटते.

गार्गी

मैत्रेयीलाच समकालीन असणारी दुसरी विदुषी म्हणजे ‛गार्गी’!

एकदा जनक राजाच्या दरबारात याज्ञवल्क्य व गार्गी यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी गार्गीने ऋषींना अनेक प्रश्न विचारले. पहिला प्रश्न होता,“ मुनिवर, असे म्हणतात की पाण्यात सर्व पदार्थ एकजीव होऊन जातात. मग हे पाणी कशात मिसळते?” ऋषींनी लगेच उत्तर दिले,“ वायूमध्ये” मग तिने पुन्हा विचारले,“वायू कशात मिसळतो?” ,“ वायू?”- “ आकाश…” – “आकाश?” – गंधर्वलोक—- अशा पद्धतीने प्रश्न विचारत ते ब्रह्मलोकपर्यंत जातात. त्यानंतर मात्र ऋषी तिला म्हणतात, “आता इथेच थांब, कारण ब्रह्मज्ञान हाच सृष्टीचा शेवट आहे.” गार्गीला हेच हवे असते. कारण तिला सृष्टीची उत्पत्ती जाणून घ्यायची असते. त्यानंतर ती दोनच प्रश्न ऋषींना विचारते,“ या अंतरीक्षाच्या वर आणि पृथ्वीच्या खाली काय आहे? आणि जे घडून गेले आहे आणि जे होणार आहे ते काय आहे?” अर्थात तिचे हे दोन्ही प्रश्न म्हणजे सध्याच्या भौतिकशास्त्राच्या भाषेत म्हणायचे तर अवकाश( space) आणि काळ (time) यासंदर्भात होते त्यावर याज्ञवल्क्य ऋषींनी तिला अक्षर म्हणजेच कधीही नष्ट न होणारे म्हणजेच अविनाशी तत्वाचे ज्ञान दिले. तेव्हा त्यांच्या त्या विद्वत्तेला प्रणाम करून तिने त्यांना गुरुस्थानी मानले.

इथे विद्वान असणाऱ्या गार्गीची निगर्वी वृत्ती दिसून येते. ज्ञान मिळवण्याची लालसा आहे. त्यासाठी चर्चा करण्याची क्षमताही तिच्याकडे आहे.  पण त्याचबरोबर ज्ञानवृद्ध व्यक्तीबद्दल असणारा आदर आणि आपल्या ज्ञानातील त्रुटीही ती लगेच मान्य करते.

वेदकाळातील या दोन स्त्रिया हे त्या काळातील समाजाचा आरसा आहे असे मला वाटते.आजही जिथे अनेक ठिकाणी स्त्रियांना दुय्यम वागणूक मिळत असताना हजारो वर्षांपूर्वीची आपली संस्कृती मात्र स्त्रियांना बरोबरीचे स्थान देत होती ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणूनच माझ्या नवरात्रीतील पहिल्या दोन माळा संस्कृत साहित्यातील या दोन सशक्त स्त्रियांच्या चरणी अर्पण!

© डॉ. मेधा फणसळकर

सिंधुदुर्ग.

मो 9423019961

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सण दिवाळीचा ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ सण दिवाळीचा ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

दिवाळी हा सगळीकडे साजरा होणारा महत्त्वाचा सण. सणसमारंभ असतातच मुळी उत्साहवर्धक वातावरण निर्मितीसाठी. नुकतचं  नवरात्र होऊन गेलेलं असतं त्यामुळे नवरात्रा पासूनच बाजारपेठा सजायला सुरवात झाली असते. खरचं हे सणसमारंभ असतातच मुळी आपल्यातील मरगळ झटकण्यासाठी. हे सणसमारंभच आपल्या संस्कृतीला घट्ट जखडून ठेवतात त्यामुळेच नात्यानात्यातील एकोपा वाढीस लागतो.

अर्थात पूर्वी आणि आता सण साजरे करण्याच्या पद्धतीत अमुलाग्र फरक पडलायं. पूर्वी एकतर संयुक्त मोठे कुटुंब, वेळेची भरपूर उपलब्धी,हौस आणि त्यामानाने महागाई चा भस्मासुर जरा कमी होता.

आताच्या दिवाळीत आणि आम्ही लहान असायच्या दिवाळीत बराच फरक पडलायं. काही गोष्टी ह्या कमावल्या आणि काही गोष्टी ह्या गमावल्यात. सगळ्यातं पहिली गोष्ट म्हणजे खूप प्रतीक्षेनंतर, थोड्याश्या हट्टानंतर मिळणाऱ्या छोट्याशा गोष्टी पूर्वी खूप मोठ्ठा आनंद देऊन जायच्या,तेच आता सहज  साध्य झालेल्या मोठ्ठ्या खरेद्या पण अल्प आनंद देऊन जातात. पूर्वी घरगुती फराळ करायचे, तो फराळ बनवितांनाचे आईचे कष्ट, तिने घेतलेली अपार मेहनत आतून खूप जाणवून आणि समजावून जायची हेच आता रेडीमेड पदार्थ आणतांना ती कष्टांच्या भावनेची जाणीवच लुप्त झालीय. पण एक म्हणजे आताच्या सणांमध्ये सुबत्ता आलीय आणि पुर्वीच्या सणांना एक काटकसरीची झालर ही होतीच.

दिवाळीचा उत्साह हा महिलावर्ग आणि बच्चेकंपनी ह्यामध्ये काकणभरं जास्तच असतो जसं पक्वान्नामध्ये पदार्थांचा राजा म्हंटले की पुरणपोळीच,बाकी सगळे पक्वान्न ह्यानंतरच त्याप्रमाणे सणांचा राजा म्हंटले की दिवाळीच बाकी सगळे सणवार ह्याच्याखालीच. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे दिवाळी हा सण अगदी उत्साहवर्धक काळात येतो.नुकताच पावसाळा संपून आँक्टोबर हीट कमी होऊन हव्याहव्याशा वाटणा-या गुलाबी थंडीला नुकतीच सुरवात झालेली असते.ह्या दिवसात वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद मनमुराद घेऊ शकतो कारण हा काळ पचनास सर्वोत्तम काळ असतो.भारत हा कृषीप्रधान देश असल्याने ह्या दिवसात शेतकऱ्यांच्या हातात पहिले पीक येऊन जरा ब-यापैकी पैसा हातात खुळखुळतं असतो. ह्या दिवसात ह्यामुळे व्यापारातील मंदी कमी होऊन व्यापारउदीमासाठीसुद्धा हा काळ उत्साहवर्धक व तेजीचा ठरतो.

दिवाळीचं प्रमुख आकर्षण म्हणजे महिलांना खरेदी आणि धावती का होईना ह्या निमीत्त्याने माहेरी धावती का होईना टाकायला मिळणारी एक चक्कर हे असतं.आपल्या वाटेकडे आईबाबा अगदी डोळेलावून बसलेले असतात. आपण यायच्या वेळेस बरोबर बाबांचे व-ह्यांड्यात खुर्ची टाकून पेपर चाळतं बसणे म्हणजे नजर पेपरमध्ये पण कान मात्र आपल्या आगमनाची चाहूल घेणारे. आईची सारखी आतबाहेर चकरा करीत वाट बघणे सुरुच असते.खरचं हे अविस्मरणीय क्षणं टिपण्यासाठी आणि आठवणींच्या कुपीत कायमचे जपण्यासाठी तरी माहेरी जायला यनं ओढ हे घेतच.

बहिणीबहीणींनी कितीही ठरविले तरी एकमेकींकडे जाणं होतचं असं नाही. पण ह्या माहेरच्या दुव्याने आम्ही बहिणीपण मनमोकळ्या राहू शकतो.आम्ही भावंड एकत्र आलोत की गप्पा संपत नाही, हास्याचे फवारे थांबत नाही आणि जुन्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन देऊन मनं ही भरत नाही. त्यात आता भरीसभर आमची मुलं ही आमच्या टीम मध्ये सामील.हे प्रेमाचे एकत्रीकरण बघून आईबाबांच्या डोळ्यात जे समाधान दिसतं नं त्यापुढे सगळी सुखं फिकीच.

एक मजा वाटते एरवी आपल्याला कोणी लहानशी गोष्ट जरी देऊ केली तरी आपल्याला संकोचाच्या ओझ्याखाली दबायला होतं पण आईबाबांनी दिलेल्या मोठ्याही गोष्टीवर आपला हक्क आहे असा मोकळेपणा माहेरी वाटतो.आईबाबांनी खूप कष्ट करून, प्रसंगी स्वतःचे मन मारून जमविलेली पुंजी हे किती ह्या सणासुदीच्या निमीत्त्याने आपल्याला घसघशीत सहजतेने निर्मोहीपणे देऊन टाकतात हे फक्त आणि फक्त आईवडीलच करू शकतात.

.दिवाळी करून घरी परततांना एका बँगेच्या दोन तीन मोठ्या बँग्ज् झालेल्या असतातच.त्या बँग फक्त सामानानेच नव्हे तर आनंदाने आणि सुखाने सुद्धा गच्च भरलेल्या असतात. त्या सामानात आईच्या हातचा गरम मसाला, वर्षाचे साठवणूक करता येणारे पदार्थ हमखास असतातच ज्यापूढे जगाच्या बाजारात कितीही पैसे ओतून घेतलेल्या ह्या वस्तू आईच्या हातच्या मायेच्या उबेपुढे फिक्क्याच असतात.

अशा त-हेने दिवाळीहुन परततांना जी मायेची,प्रेमाची शिदोरी मिळते त्या आठवणींवर आपण उन्ह्याळ्यापर्यंत सहज मन.रमवितो.मग परत आहेच आमरसाला माहेरी चक्कर.

प्रत्येक श्वासागणिक मनात आठवण असणारे आईबाबा,जीव ओतून प्रेम करणारी बहीण आणि माहेरपणची ओढ टिकवून ठेवणारा भाऊ असल्याने मी खूप नशीबवान आणि श्रीमंत व्यक्ती असल्याचा माझाच मल साक्षात्कार होतो.

परतीची वेळ थोडी अवघड असते.परत तेच पेपर हातात धरून बसलेले बाबा न बोलता जणू नुसते नजरेनेच सांगतात लौकर परत या गं, आई फाटकापर्यंत येऊन परत परत स्वतःची काळजी घ्यायला बजावत असते.अशा वेळी गाण्याच्या ओळी आठवतात,

 “मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं?

काय पुण्य असतं की जे घरबसल्या मिळतं।”

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अंतरिचे दीप ☆ श्री ओंकार कुंभार ☆

?  विविधा ?

☆ अंतरिचे दीप ☆ श्री ओंकार कुंभार ☆ 

एकदाची सुट्टी लागली. सत्र १ चे पेपर संपले. दीपावलीच्या सुट्टीला सुरूवात झाली.

आणि मग किल्ला करायची लगबग सुरू झाली असणार. दगडे गोळा करणे, माती आणणे, ती चाळणे, दगडे कल्पकतेनं रचणे, त्यावर चिखलाचा काला लावणे, चिखल ओला असतानाच त्यावर हळीव टाकणे आणि मग काही दिवसांनी किल्ल्यावर त्या हळिवाचं छान घनदाट जंगल तयार होतं. मस्तच.

नंतर जुने आणि नवीन आणलेले छ.शिवाजी महाराज व सैनिक त्यावर ठेवणं… नवनिर्मितीचा आनंद. आनंदीआनंद. सृजनशिलतेचा  सोहळाच जणु.

त्यापूर्वीच घरातल्या फराळात मदत करणं, “अरे करंज्यात एवढच सारण घालायचं, अशा व्यवस्थित चिटकवून कोरणीनं व्यवस्थित कोरायचं.” ” कसलं डिझाईन केलयस हे चकलीचं.” “लाडू दोन्ही हातांनी वळायचे, म्हणजे छान गोलाकार होतात.” “शंकरपाळ्या व्यवस्थित कट करायच्या.” (मदत करताकरता फराळाचा आस्वाद घेणं हे तर ओघानच आलं.😄) हे संवाद घरोघरी ऐकायला येत असतील.  हाही एक आनंददायी सोहळाच असतो.😄

पाहुण्यांना भेटणं, विविध माध्यमांतून दीपावली च्या शुभेच्छा सदिच्छा देणं-घेणं. हे सगळं काही मनाला आनंद देणारं असतं. त्यानंतर हळुहळू दिवाळी संपते. सुट्टी संपण्याच्या दिशेनं काळाचा प्रवास सुरू होतो. मग,  कुठे फँमिली ट्रीपचे नियोजन होते. तर, कुठे वनडे ट्रेकचे नियोजन. घरातून बाहेर निसर्गात भटकंती केली की, एकदम फ्रेश होतो आपण.

दिवाळीत जसे दिव्यांनी- फुलांनी घर सजवतो, प्रकाशित करतो. त्याप्रमाणे आपल्या अंतरीचे दीप ही प्रज्वलित करायला हवेत.

म्हणजेच आपलं स्वत्व हे जपता यायला हवं आपणाला. आपल्या मध्ये असणा-या बेस्ट क्वालिटीज ओळखायला, जपायला आणि वाढवता यायला हव्यात. आपल्यामधील नको असणारा भाग (वाईट गोष्टी) हळूहळू काढून टाकता यायला हव्यात. मग, ती एखादी वाईट सवय असेल.

एखादा छान छंद जोपासता येईल. अवांतर पुस्तक वाचन, छानसं चित्र काढणे, चित्र काढायला शिकणे, डिझाईन काढणे, सुंदर रांगोळी- मेहंदी काढायला शिकणे, एखादी कला आत्मसात करणे, कथा-कविता लेखन करणे. यातलं जे जमेल ते आणि जे अंगभूत(In built) असेल ते करणं-करायला शिकणं. आपल्यातील वेगळेपणामुळे आपल्याला समाजात आदराचं स्थान निश्चितच मिळते.

यातून सृजनशिलतेची, नवनिर्मितीची एक अलौकिक आनंदानुभुती प्राप्त होते. ज्या आनंदाची कशाशीच तुलना होऊ शकत नाही. जो आनंद दीर्घकाळ टिकतो.

हा अलौकिक आनंद मिळवणं म्हणजेच आपल्या अंतरिचा दीप प्रज्वलित करणं होय. नाही का?

मग करूयात ना प्रज्वलीत आपण आपल्या अंतरीचे दीप या दीपावली निमित्त?

🍁 दीपावलीच्या सर्वांना मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा 🍁

© ओंकार कुंभार

📱9921108879

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares