मराठी साहित्य – विविधा ☆ कुठे शोधीसी…? ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ कुठे शोधीसी…? ☆ श्री अरविंद लिमये ☆

आपलं संपूर्ण जगणंच व्यापून टाकणारा, अपरिमित ऊर्जा ठासून भरलेला असा एक शब्द म्हणजे शक्ति ! हा शब्द स्वतःच शक्तिशाली आहे कारण शक्तिची असंख्य रुपे त्याने स्वतःत सामावून घेतलेली आहेत.

शक्ति या शब्दाच्या अर्थात लपलेले विविध बारकावे लक्षात घेतले तर जगरहाटीतलं शक्तिचं आस्तित्व आणि महत्त्व दोन्हींची कल्पना येईल.

शक्ति म्हणजे सामर्थ्य,बळ,जोर ताकत तसंच कुवत,दम आणि रगही.शक्ति म्हणजे प्राबल्य, क्षमता, मातब्बरी जसं तसंच त्राण, जोश, प्रभाव, पात्रता,अवसान,आवेग आणि आवाका सुध्दा!शक्ति म्हंटलं की हे सगळं सहज सुचणारं पण म्हणून फक्त एवढंच नाही तर यापेक्षाही बरंच कांही विचारप्रवृत्त करणारं आणि जगणं सजग करणारंही.

हिंदू धर्मानुसार जागृत देवस्थान म्हणून मान्यता मिळालेली अतिशय प्राचीन अशी नैनादेवी, अमरनाथ, पुष्कर, अमरकंटक, सोमनाथ, वृंदावन, अंबाजी, मानसरोवर.. अशी एकूण पन्नास शक्तिपीठे आहेत.या आणि अशाच श्रध्देने मनात जपलेल्या इतरही विविध  दैवतांची ही शक्तिशाली देवस्थाने म्हणजे दैवीशक्तीची जनमानसातील प्रतिकेच! या श्रद्धेमुळे मिळणारी मन:शांती वादातीत असली तरी जीवन व्यतित करताना रोजच्या व्यवहारांसाठी अशा परस्वाधिन मन:शांतीकडे अनेकदा प्रश्नांची सोडवणूक करणारा एकमेव मार्ग म्हणून पहाणे उचित ठरणारे नाही.खरंतर त्यासाठी  शक्तिची प्रतिकारशक्ती,सहनशक्ती क्रयशक्ती, प्राणशक्ति, आत्मशक्ति,विचारशक्ति अशी इतर रुपेही प्रयत्नपूर्वक अभ्यासून त्यांची प्राप्ती होण्यासाठी प्रयत्नशीलही रहायला हवे.  

इथे दैवी शक्तीला नाकारणे अपेक्षित नाहीय तर तीच दैवी शक्ती कणरुपाने आपल्याठायीही वसते आहे हे लक्षात घेऊन शरीर आणि मनाच्या संदर्भात लिहिण्याच्या ओघात वर उल्लेख केलेली आणि इतरही शक्तिरुपे आपल्या भावनिक, मानसिक, बौध्दीक, शारीरिक आणि आत्मिक उत्कर्षासाठी कशी महत्त्वाची ठरतात हे जाणून घ्यायला हवे.हे साध्य होण्यासाठी, हे  शोधण्यासाठी कुठे बाहेर फिरत बसायची गरज नाहीय तर त्यासाठी फक्त स्वतःच्या आंत जाणीवपूर्वक डोकवायला हवे फक्त ! हे फार अवघड नाही आणि मनावर नाही घेतले तर सोपेही नाही !

‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हे खरेच,पण ते फक्त जन्म न् मृत्यू यापुरतेच.या दोन टोकांमधला प्रवासही जर आपण प्रत्येक क्षणी स्वतःला सर्वच बाबतीत पराधीन समजून ‘असेल माझा हरी…’ म्हणत प्रयत्नांची पराकाष्ठा न करता खाटल्यावर झोपूनच रहाणार असू तर परमेश्वराने जे असं इतकं मोलाचं आपल्याला दिलेय त्याची पुसटशीही जाणीव आपल्याला कधी होणंच शक्य नाही!

 हे मोलाचं म्हणजे नेमकं काय? या प्रश्नाचं परिपूर्ण उत्तर एका शब्दात द्यायचं तर शक्ति!

 शक्ती म्हणजे सामर्थ्य, कुवत,  क्षमता हे झालंच. पण शक्ति या शब्दात सामावलेलं याही पलिकडचं बरंच कांही शक्ति या शब्दाचे अर्थ व्यक्त करणाऱ्या अशा मोजक्या शब्दांत मावणारं नाहीय.

 शक्ति म्हटलं की चटकन् नजरेसमोर येते ती आपली शारीरिक क्षमता. सहजपणे दृश्य रूप असणारी,अनुभवता येणारी ही शरीरक्षमता शरीराच्या स्वाधीन मात्र नसते.ती पूर्णतःपरस्वाधिनच  असते. आपण आपली शरीरक्षमता शिस्तबद्ध आचार आणि प्रयत्न याद्वारे सक्षम ठेवू शकत असलो तरी ते आपल्या मनाची साथ असेपर्यंतच. मन अस्वस्थ असेल तर  मनातील भावनांच्या कल्लोळामुळे निर्माण होणाऱ्या  अस्थिरतेत ही प्रयत्नपूर्वक मिळवलेली शारीरिक क्षमता जशी वेगाने कमीही होऊ शकते तसेच एरवी स्वस्थ,आनंदी असणारे मनही आपल्या शारीरिक आजार,तक्रारी यामुळे निर्माण होणाऱ्या बेचैनीच्या सावल्यांनी ग्रासूनही जाऊ शकते.

 याचाच अर्थ शारीरिक शक्ति आणि मनोबल याचा विचार करता शरीर आणि मन दोन्हीही याबाबतीत पूर्णतः परस्परावलंबी असतात हे ओघाने आलेच. शरीरमनाचा हा एकोपा अबाधित ठेवणं बऱ्याच प्रमाणात आपल्या हाती असेलही कदाचित पण त्यासाठी आवश्यक असणारी सजगता मात्र खूप कमी जणांकडे असते.त्यासाठी आवश्यक आहे ते आनंदी जगण्याचं रहस्य जाणून घ्यायचा प्रयत्न करणं.पण सर्रास भौतिक सुखाला सर्वाधिक प्राधान्य देणाऱ्या आजच्या जीवनशैलीत ही रहस्यउकल सहजशक्य होणं कठीणच.कारण त्यांची निकड जाणवण्याइतकी उत्कट भावना व्यवहारी मन आणि विचारांमुळे निर्माण होणे अशक्यप्राय असते.

 जगणं आनंदी करण्यासाठी स्वतःच्या नैसर्गिक क्षमतांचे यथायोग्य आकलन करून घेऊन त्याचा योग्य वापर करणारे त्यामुळेच हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच असतील.

इथे स्वतःच्या नैसर्गिक क्षमता म्हणजे शारीरिक क्षमता किंवा मनाचा कणखरपणा, मनोबल वगैरे शब्दांतून व्यक्त होणाऱ्या मनाच्या क्षमता अभिप्रेत नाहीयेत. इथे अभिप्रेत आहे ते याही पलीकडचं ‘अंत:प्रेरणा’, ‘आतला आवाज’ वगैरे जिथून उमटतं कसं गृहित धरलेलं असतं ते. चराचर व्यापूनही कणभर उरत असणारं जे परमतत्त्व ते आपल्या अंतरातही जिथं वसलेलं असतं ते ! ते प्रत्येकाच्याच अंतरात असतंच !!

आपल्या विचारांमुळे, कृतीमुळे कुणालाही न दुखावता वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग्य विचार करून आपल्या      सद्सद्विवेकाला साक्षी ठेवून कार्यमग्न असणारी नास्तिक व्यक्ती देवाचं आस्तित्त्व न मानताही सुखी,आनंदी आणि यशस्वी जीवन जशी व्यतीत करु शकते तशीच एखादी आस्तिक व्यक्तीही देवपूजा,व्रतवैकल्ये, शुचिर्भूत विचार यांची कास धरून परमेश्वरावरील अतूट श्रद्धेने वाटचाल करीत जीवन कृतार्थही करू शकते.याचाच अर्थ वैचारीक बैठक वेगळी असली तरी आपल्या निसर्गदत्त क्षमतांचं महत्त्व जाणून घेऊन त्याचा पुरेपूर वापर करणेही अवघड नसते.या क्षमता हीच खरी निसर्गदत्त शक्ति! ही शक्ति नेमकी असते कुठे ?आणि ती सहजपणे जाणवत कशी नाही? असे प्रश्न पडले तरच त्यांच्या उत्तरांचा शोध सुरु होईल आणि त्या शोधवाटांवरचा प्रवासही!

या प्रश्नांचं उत्तर म्हंटलं तर अगदी सरळ साधं पण ते प्रथमदर्शनी तरी अनाकलनीय वाटेल असंच.

जळी,स्थळी,काष्ठी,पाषाणी जसा परमेश्वर तशीच ही परमशक्तीही ‘यत्र तत्र सर्वत्र’! त्यामुळेच ती अंशरूपाने आपल्याच अंतरातही वास करीत असतेच. ती सुप्त असल्यामुळे जाणवत नाही. तिला जाणून घेणे, ओळखणे हे जाणिवपूर्वक केले तरच शक्य असते.

आपल्याला निसर्गाकडून प्राप्त झालेल्या असंख्य क्षमतांसारखीच अतिशय मोलाची देन म्हणजे आपलं अंतर्मन! आपलं अंतर्मन म्हणजे आपल्या स्वतःच्या स्वाधीन असलेलं एक परमशक्तीकेंद्रच! निसर्गाकडूनच बहाल केलं गेलेलं ज्याचं त्याचं हक्काचं असं एक गूढ शक्तिपीठ! अगदी कलियुगातही थक्क वाटावेत असे चमत्कार घडवण्याची अपारशक्ती या शक्तीपीठातच सामावलेली आहे. वरवर पाहता आपल्या शरीर न् मनाची सूत्रं मेंदूकडे असतात असं आपण समजतो तो मेंदूही खऱ्या अर्थाने अधिकारकक्षेत येतो ते या अंतर्मनरूपी शक्तीपीठाच्याच! सर्वसाधारण दैनंदिन व्यवहार मेंदूच्या स्वाधीन करून अंतर्मन सुप्तावस्थेत रहाते खरे पण अचानक उद्भवलेल्या कसोटीच्या,आकस्मिक आणीबाणीच्या क्षणी आपल्याही नकळत तत्परतेने घडणाऱ्या आपल्या प्रतिक्षिप्त क्रिया घडवल्या जातात ते अंतर्मनाने समयसूचकतेने मेंदूला दिलेल्या तत्क्षणीच्या सूचनांमुळेच. अंत: प्रेरणा म्हणतात ती हीच! आपलं शरीर,मन,बुद्धी या  त्रिशक्तींचं भान सकारात्मक विचार आणि मूल्याधिष्ठित आचार यामुळे जाणिवपूर्वक प्रदूषणरहित ठेवण्याचा प्रयत्न प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण असेल तर अशा कसोटीच्या,आणीबाणीच्या, आकस्मिक संकटाच्या क्षणी कार्यरत होणाऱ्या प्रतिक्षिप्त क्रिया एखादा चमत्कार घडावा तशी आपलं सुरक्षाकवच बनून आपल्याला सावरतात.आपलं रक्षण करतात. आणि त्या मागचं रहस्य माहित नसलेले आपण ‘माझी वेळ चांगली होती’, किंवा ‘ही परमेश्वराचीच कृपा’ असे म्हणून आपले समाधान करुन घेतो. पण ती खरंतर आपल्या अंतर्मनाच्या सुप्तशक्तीचीच किमया असते!ही परमशक्ती हाच आपला अंतरात्मा..! पण हे कार्यकारणभाव आपण कधी जाणीवपूर्वक समजून मात्र घेतलेले नसतात.

हे समजून न घेतल्यामुळेच आपल्या आयुष्यभराच्या या जगातल्या वास्तव्यात आपल्या अंतर्मनाच्या सुप्तशक्तीचा वापर फार फार तर एखादाच टक्का केला जात असतो आणि एवढी मोलाची बाकी राहिलेली 99% परमशक्ती मात्र कधी वापरलीच न गेल्याने सुप्तावस्थेतच नाहीशी होत असते!

एरवीची आपली इच्छा कितीही प्रबळ असली तरी ती इच्छाशक्ति आपल्या अपेक्षेनुसार म्हणावी तशी सक्षम असूच शकत नाही. ती जेव्हा आपल्या अंतर्मनातून तिथल्या आंतरिक सशक्ततेने  वर झेपावते तेव्हाच ती इच्छाशक्ति ‘उत्कट’ असते आणि अशी उत्कट इच्छाशक्तिच आश्चर्यकारकरित्या फलद्रूप होऊ शकते!

‘कुठे शोधीसी रामेश्वर अन् कुठे शोधीसी काशी….

हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी..’ अशी आपली अवस्था आहे ते हे अंतर्मनाचे गूढ उकलण्याचा प्रयत्न आपण कधीच न केल्याने. ते गूढ उकलण्याच्या असंख्य सहजसोप्या वाटा शोधण्यासाठी निखळ श्रध्देचं बोट धरुन अध्यात्माच्या वाटेवर पडणारं आपलं पहिलं पाऊलच महत्त्वाचं. पुढची वाटचाल अंत:प्रेरणेनेच आपसूक सुकर होईल हे निर्विवाद!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – पुष्प – भाग ४० – परिव्राजक १८. गोमंतक ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार– विचार–पुष्प – भाग ४० – परिव्राजक १८. गोमंतक ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

बेळगावहून स्वामीजी मार्मा गोवा मेलने निघाले आणि मडगाव येथे उतरले. बेळगावचे सुप्रसिद्ध डॉक्टर विष्णुपंत शिरगावकर यांनी गोव्यातल्या व्यवस्थेसाठी मडगाव इथले त्यांचे विद्वान मित्र सुब्राय लक्ष्मण नायक यांना परिचय पत्र दिले होते आणि स्वामीजींची निवास आणि भोजन व्यवस्था करायला सांगितली होती. स्वामीजींना घ्यायला स्टेशनवर नायक स्वत: जातीने हजर होते, तेही शेकडो लोकांच्या समवेत. आणि काय आश्चर्य त्यांनी स्वामीजींना घोडा गाडीतून मिरवणूक काढून समारंभपूर्वक घरी नेले. हे सर्व स्वामीजींना खूपच अनपेक्षित होते. आयुष्यात त्यांना असा अनुभव प्रथमच आला होता. स्वामीजींचा परिचय झाल्यावर त्यांनी सुब्राय नायक यांना आपला गोव्याला येण्याचा हेतु सांगितला. ख्रिस्त धर्माविषयीचे मूळ ग्रंथ त्यांना इथे अभ्यासायचे होते. ज्या ज्या प्रांतात जी जी वैशिष्ठ्ये असायची त्याची माहिती ते करून घेत.  

सुब्राय नायक हे तीव्र मेधाशक्ती असलेले वेदान्त आणि आयुर्वेद शास्त्राचे जाणकार होते. शिवाय संस्कृतमधील न्यायमीमांसा व  ज्योतिष यातही पारंगत होते. नायक हे त्यावेळी धार्मिक आणि सामाजिक नवजागरणाची धुरा वहात होते. त्यांच्यासाठी तर स्वामीजींचे आपल्या घरात वास्तव्य आणि सहवास म्हणजे एक चांगली पर्वणीच होती.

मठग्राम म्हणजेच मडगाव हे पोर्तुगीजांचा प्रभाव असलेले दक्षिण गोव्यातले ऐतिहासिक शहर. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मध्यभागी  पश्चिम घाटात वसलेला गोवा समुद्र तटावरील रमणीय भूभाग म्हणून सर्वांनाच आकर्षित करतो. १५१० पासून हा भाग पोर्तुगीजांच्या हुकूमाखाली जवळ जवळ साडेचारशे वर्ष होता. पोर्तुगीजांनी साम, दाम, दंड, भेद य मार्गाने इथले अनेक तालुके काबीज केले होते. आशियातले सर्वात मोठे ख्रिश्चन यात्रा स्थळ, ‘बसिलिका ऑफ बॉम जिझस’ इथे गोव्यात आहे. प्राचीन मंदिरं आहेत. या वास्तू वैशिष्ठ्यपूर्ण वास्तूकलेसाठीही प्रसिद्ध आहेत. विवेकानंदांचा गोव्याला भेट देण्याचा हाच उद्देश होता. देवदर्शना बरोबरच गोव्यातली प्रमुख स्थळे, तिथली धर्मपीठे, जुने चर्च, फोंडा प्रदेशातील मंदिरे, पुरातन देवालये यांची माहिती करून घेणे आणि या प्रदेशातील ग्रामीण आणि शहरी लोकजीवन, समाजावरील धर्माचा प्रभाव व इतिहास जाणून घेणे हा पण दूसरा उद्देश होता.

सुब्राय नायक यांच्या घराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. चारशे वर्षापूर्वी धर्मांध ख्रिश्चनांनी मडगावची ग्रामदेवता असलेल्या श्री दामोदर मंदिराचा आणि गावातल्या इतर हिंदू मंदिरांचा विध्वंस केला. हिंदूंना गावात एकही मंदिर शिल्लक राहिलं नाही. अशा परिस्थितीत नायक कुटुंबाने श्री दामोदर या आपल्या कुलदेवतेला राहत्या घराच्या मोठ्या गर्भगृहात स्थान देऊन वाचविले आणि पुढे सर्व हिंदूंना ते भक्तीसाठी खुले करून दिले. इथेच नंतर मठग्रामस्थ हिंदू सभेची स्थापना केली गेली. मडगावातल्या आबाद फारीया  रोडवरचं ‘नायक मॅन्शन’ सामाजिक संस्कृतिक आणि नियमित उपक्रमाचं स्थान बनलं. याला दामोदर साल म्हणून ओळखतात. साल म्हणजे हॉल. गोव्यातील काही विशिष्ट घरांपैकी सुब्राय नायक यांचं पारंपारिक चौसोपी वाड्याचे एक प्रशस्त घर जिथे स्वामीजी काही दिवस राहिले होते.

स्वामीजींच्या सहवासामुळे त्यांची समाजोद्धाराची तळमळ, वैदिक तत्वज्ञानाद्वारे लोकांची उन्नती करण्याची त्यांची क्षमता, जीवनातील सर्वोच्च कर्तव्याविषयी असलेली अत्त्युच निष्ठा पाहून सुब्राय नायक प्रभावित झाले . स्वामीजींच्या गायन वादनातल्या परिपक्वतेचा अनुभव सुद्धा यावेळी गोवेकर मंडळींनी घेतला.

इथल्या वास्तव्यात स्वामीजींनी एकदा एक चीज काही रागातून पाऊण तास गायली. सर्वजण आश्चर्य चकित झाले. नायक यांनी, लयकारीची उत्तम जाण असलेले प्रसिद्ध तबला वादक व संगीतातल्या पिढीजात घराण्यात जन्मलेले खाप्रूजी अर्थात लक्ष्मणराव पर्वतकर, यांना बोलवून घेतले आणि स्वामीजींसमोर तबला वादन करायला सांगितले. त्यांनी सफाईदार तबलावादन सादर केले. हे ऐकून स्वामीजी म्हणाले, “लाकडाच्या खोक्याच्या कडेवर बोटे फिरवून आवाज काढता, तसाच आवाज वरच्या चामड्याच्या थरातून काढता आला पाहिजे”. खाप्रुजींना हे काही पटेना. त्यांना वाटलं स्वामी चेष्टाच करताहेत. तोच स्वामीजी उठले, कोचावरून खाली बैठक मारून बसले आणि तबल्याच्या चामड्यातून सुंदर आवाज काढून दाखविला. हा प्रकार पाहून सर्व श्रोते दि:ग्मूढ झाले. पर्वतकर यांनी स्वामीजींची क्षमा मागून साष्टांग नमस्कार घातला. याच खाप्रूमामा पर्वतकरांना पुढे १९३८ मध्ये प्रख्यात गायक अल्लादिया खाँ यांच्या हस्ते ‘लयभास्कर’ पदवीने गौरविण्यात आले. स्वामीजींची भेट ही पर्वतकर मामांच्या आयुष्यातली भाग्याचीच घटना म्हणायला हवी.

स्वामीजींना गोव्यातील ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या पुरातन लॅटिन ग्रंथातून ख्रिश्चन धर्माचा इतिहास व तत्वज्ञान याचा अभ्यास करायचा होता. तिथल्या समाजावर होणार्‍या धर्मपरिवर्तनाचा प्रभाव जाणून घ्यायचा होता. असे दुर्मिळ ग्रंथ इथे उपलब्ध होते. रायतूर (राशेल) येथील सेमिनरी १५७६ मध्ये बांधलेले असे प्राचीन होते, तिथे प्राचीन हस्तलिखिते आणि मडगावतील प्रसिद्ध वकील जुजे फिलिप अल्वारीस यांना बोलवून स्वामीजीची ओळख करून दिली आणि सेमिनरी व तिथले ग्रंथ दाखविण्याची सोय नायक यांनी केली. तिथल्या पाद्रींची ओळख करून दिली, स्वामीजी दोन दिवस रायतूरला सेमिनरीत राहिले, स्वामीजींनी त्या सेमिनरीतल्या विद्यार्थ्यांची पण भेट घेऊन त्यांची मते जाणून घेतली. आजही त्या लायब्ररीत स्वामीजींचा फोटो लावला आहे.

रायतूरच्या भेटीनंतर मडगावात स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाची जिकडे तिकडे चर्चा झाली. दूरदुरून पाद्री लोक तसेच ख्रिश्चन समाजातील अनेक विद्वान, जज्ज, बॅरिस्टर मडगावमध्ये त्यांना भेटायला येत. स्वामीजी फ्रेंच, लॅटिन, इंग्रजी भाषेत त्यांना आपली अभ्यासपूर्ण मतं समजाऊन सांगत. अशी अधिकारसंपन्न व्यक्ती सर्वजण प्रथमच पाहत होते, हे बघून सगळीकडे त्यांचं कौतुक होत होतं. सुब्राय नायक यांनी तर स्वामीजींच्या गुण गौरवासाठी श्री दामोदरच्या प्रांगणात मोठी सभा भरवली. याला लोक प्रचंड संख्येने हजर होते. त्यांनी शिकागोच्या धर्म परिषदेला जाण्यासाठी स्वामीजींना शुभेच्छा दिल्या. स्वामीजी वेंगुर्ल्याच्या नगर वाचनालयात ‘संचित,प्रारब्ध व क्रियामाण’ या विषयावर व्याख्यान द्यायला पण गेले होते. वेंगुर्ला हे अरब,डच, पोर्तुगीज या राजसत्तांनी निर्माण केलेलं महत्त्वाच व्यापारी बंदर होतं. इथे १६३८ मध्ये डच वखार होती. हा इतिहास जाणून घेण्यासाठी स्वामीजी प्रत्यक्ष तिथे गेल्याचे दिसते.

गोवा येथील कवळ्याच्या शांतादुर्गा मंदिरात त्यांनी काली मातेचं एक पद खड्या आवाजात म्हणून लोकांना मंत्रमुग्ध केलं होतं. म्हाडदोळच्या म्हाळसादेवी पुढे सुंदर ख्याल गायन केलं, श्री मंगेशाच्या देवळात रागदारीतलं ध्रुपद गायन केलं.

असा भरगच्च कार्यक्रम गोवा इथं पार पाडून स्वामीजी पुढच्या प्रवासासाठी धारवाडला जायला निघाले. तेंव्हा सुब्राय नायकांबरोबर अनेक प्रतिष्ठित लोक, शेकडो नागरिक, कॅथॉलिक पाद्री निरोप द्यायला आले होते. निघण्यापूर्वी नायकांनी स्वामीजींना एक फोटो काढून मागितला होता. हाच फोटो आज पण त्या दामोदर साल मध्ये लावला आहे. ज्या खोलीत ते राहिले ती खोली, त्या वस्तु आजही नायकांच्या वारसांनी सुरक्षित जपून ठेवल्या आहेत. सुब्राय नायकांनी पुढे १९१० मध्ये संन्यास घेतला आणि ते स्वामी सुब्रम्हण्यानंद तीर्थ म्हणून ओळखले जाऊ लागले.  

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बलिप्रतिपदा व भाऊबीज ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

?  विविधा ?

☆ बलिप्रतिपदा व भाऊबीज ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

बलिप्रतिपदा किंवा पाडवा

तिसरा दिवस बलिप्रतिपदा किंवा पाडवा ! या दिवशी आपले नवीन वर्ष सुरू होते. पाडवा हा एक चांगला मुहूर्त असतो, त्यामुळे सोने खरेदी, वाहन खरेदी यासारख्या मोठ्या खरेद्या या दिवशी केल्या जातात. पती-पत्नीच्या नात्याला नव्याने उजाळा देण्याचे काम पाडव्याच्या निमित्ताने होते. त्यामुळे बायकांना या दिवशी नवऱ्याकडून मनासारख्या भेटी मिळवता येतात. या दिवशी स्त्रिया पतीला ओवाळून मिळणाऱ्या ओवाळण्याची आतुरतेने वाट बघत असतात! असा हा आनंदाचा पाडवा असतो…. भाऊबीज दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज! बहिण भावाच्या आनंदाचा दिवस! यानिमित्ताने मुली माहेरी येतात आणि आई वडील भावंडां बरोबर सण साजरा करतात. दिवाळीचा आनंद आता शिगेला पोहोचलेला असतो. दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येकालाच काही ना काही भेटी मिळालेल्या असतात तसेच एकमेकांच्या भेटी ही होतात. सणाचे दिवस कसे संपतात कळत नाही पण चार दिवसाची दिवाळी आपल्याला वर्षभरासाठी ऊर्जा देऊन जाते! तसेही आता आपण वर्षभर फराळाचे पदार्थ खातोच, कपडे खरेदी तर कायमच चालू असते त्यामुळे याचे महत्त्व फारसे वाटत नाही.

पण पूर्वीच्या काळी फराळाचे पदार्थ, कपडा खरेदी या गोष्टी प्रासंगिक असत. त्यामुळे दिवाळी कधी येते याची सर्वजण आतुरतेने वाट बघत असत. तरीही अजूनही आपल्याकडे दिवाळी म्हणजे दिव्यांचा आनंदाचा सण म्हणून आपण उत्साहाने साजरा करीत असतो…

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

?  विविधा ?

☆ नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

 नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन

नरकासुराचा वध या दिवशी केला गेला म्हणून हा विजय उत्सवाचा दिवस! दिवाळीच्या अभ्यंग स्नानाचा पहिला दिवस! गेले चार आठ दिवस  घराघरातून दिवाळीची तयारी सुरू होत असे. घर स्वच्छ करणे, डबे लख्ख घासून पुसून ठेवणे, फराळाचे सर्व प्रकारचे पदार्थ बनवणे., लाडू, चिवडा, चकली, करंज्या, शंकरपाळी हे तर व्हायलाच हवे, त्यातूनही उत्साह असेल तर अनारसे, चिरोटे! ज्या घरी दिवाळसण असेल तिथे तर अधिक उत्साह! लेक,जावई आणि सासरकडील मंडळी यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी! या दिवशी लक्षात रहाते ते नरकासुर वधाचे रेडिओ वर लागणारे कीर्तन! लवकर उठून दिवे, पणत्या लावून घरातील बाईची लगबग सुरू होते.सुवासिक तेल चांदीच्या वाटीत काढून ,पाट रांगोळी करून सर्वांना उठवायची जबाबदारी जणू तिचीच!मग मुलांचे उठल्यापासून फटाके उडवायची घाई आणि आईची आंघोळीची गडबड यांत वेळ कसा जातो कळत नाही!मुले किल्ल्यावर मावळे मांडण्यात गर्क,तर मुली रांगोळी काढण्यात!मग सर्वांना एकत्र गोळा करून तो फराळाचा मुख्य कार्यक्रम!  आपल्या कडे पहिल्या दिवशी सकाळी सर्वांना ओवाळण्याची पध्दत आहे. हे सर्व झाले की आधी जवळ मंदिर असेल तर देवदर्शन आणि मग फराळ  हे चालू राही.! फराळ आणि त्या नंतर दही पोहे खाण्याची  आमच्या कडे पध्दत होती.त्यामुळे पोट थंड रहाते!

असा हा नरक चतुर्दशी चा पहिला फराळ झाला की दिवाळीची सुरुवात झाली… लक्ष्मीपूजन काही वेळा नरकचतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन एका च दिवशी असते. अशावेळी सकाळचे फराळ झाले की दुपारच्या लक्ष्मी पूजनाची तयारी करावी लागायची. एकदा लक्ष्मीपूजन झाले की दिवाळीचे महत्त्वाचे काम आवरलेले असे. आताही बराच वेळा लक्ष्मीपूजन झाले की लोक फिरायला बाहेर पडतात….

 व्यापारी लोकांच्या दृष्टीने लक्ष्मीपूजन हे महत्त्वाचे असते. या दिवशी दुकान ची पूजा केली जाते. नवीन वह्या आणून वही पूजन केले जाते. लक्ष्मीपूजनाला भाताच्या लाह्या, बत्तासे, पेढे याचा लक्ष्मीला नैवेद्य दाखवला जातो. बाजारपेठेमध्ये फटाक्यांची आतषबाजी  होते आणि दुकानांवर भरपूर रोषणाई केलेली असते. असा हा लक्ष्मीपूजनाचा सोहळा खूप महत्त्वपूर्ण असतो…

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वसुबारस आणि धनत्रयोदशी ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

?  विविधा ?

☆ वसुबारस आणि धनत्रयोदशी ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

वसुबारस

दिवाळी या आपल्या मोठ्या सणाची सुरुवात वसुबारस पासून होते. वसुबारस म्हणजे गाई प्रति कृतज्ञता दाखवण्याचा सण!

महाराष्ट्र हे राज्य शेतीप्रधान असल्याने वसुबारस या दिवसाचे महत्त्व आहे. अश्विन कृष्ण द्वादशीला वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस याचा अर्थ वसु म्हणजे द्रव्य व त्यासाठी असलेली बारस म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी गाय वासराची पूजा केली जाते त्यांच्या पायावर पाणी घालून हळदी कुंकू वाहून पूजा करतात. गाईला नैवेद्य म्हणून पुरणपोळी खाऊ घालतात. हिंदू संस्कृतीत गाईला गोमाता समजले जाते व तिच्या उदरात देवांचा वास आहे म्हणून गाई प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तसेही आपल्या संस्कृतीत नाग, बैल अशा निसर्गात असणाऱ्या प्राण्यांचे पूजा करून ते दिवस साजरे करण्याची प्रथा आहे. वसुबारस पासून अंगणात तुळशीपाशी घराबाहेर पणत्या, आकाश कंदील लावून दिवाळीची सुरुवात केली जाते..

 धनत्रयोदशी

दिवाळी सणाचा दुसरा दिवस धनत्रयोदशी या दिवशी धनाची पूजा करतात. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे डॉक्टर वैद्य लोक धन्वंतरी ची पूजा करतात धने गुळ याचा नैवेद्य दाखवतात ज्या वैद्यकीय बुद्धीच्या जोरावर आपण रोग्याला बरे करू शकतो, त्या धन्वंतरी बद्दल आदर, कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी!

आता दिवाळी अगदी दारात आलेली असते. पूर्वीच्या काळी घराला अंगण असे त्यामुळे सकाळ, संध्याकाळ अंगणात सडा मारून, दारात रांगोळी काढणे, पणत्या लावणे असा कार्यक्रम होत असे. आता फ्लॅट सिस्टीम मुळे ही मजा गेली, तरीही आपल्या छोट्याशा ब्लॉकच्या आत आनंदोत्सव साजरा करायचा म्हणजे आनंदालाच बंधन घातल्यासारखे वाटते! पण कालाय तस्मै नमः !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग ३९ – परिव्राजक १७. बेळगांव आणि हरिपद मित्र ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग ३९ – परिव्राजक १७. बेळगांव आणि हरिपद मित्र ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

बेळगाव मध्ये स्वामीजींचा सहवास लाभलेले आणखी एक कुटुंब म्हणजे, हरिपद मित्र आणि त्यांच्या पत्नी सौ इंदुमती मित्र. हरिपद मित्र वन खात्यात विभागीय अधिकारी होते. ते बंगाली असल्याने भाटे वकील ओळख करून द्यायला स्वामीजींना त्यांच्या घरी घेऊन गेले. दारात, शांत, सौम्य, तेजस्वी, दाढी केलेला तरुण संन्यासी, पायात मराठी वहाणा, अंगात भगवी कफनी, डोक्याला भगवा फेटा असं आकर्षक व्यक्तिमत्व पाहून, हरिपद यांना क्षणभर भुरळच पडली. पण पुढच्याच क्षणी तो आपल्याकडे काही मागण्यासच आला असावा, कारण संन्यासी म्हणजे लुच्चा लफंगा असे त्यांचे मत झाले. भाटे वकिलांनी परिचय करून दिल्यावर एका महाराष्ट्रियन ब्राम्हणाकडे बंगाल्याचे जमणे कठीणच म्हणून ते आपल्याकडे रहाण्यासाठीच आले असावेत अशीही भावना झाली. म्हणून हरिपदांनी स्वामीजींना विचारले तुमचं सामान इथेच आणून घेऊ का?

स्वामीजी म्हणाले, “मी वकील साहेबांकडे अगदी आरामात आहे. ते सारे आपल्याला फार प्रेमाने वागवतात. कोणीतरी बंगाली भेटल्यामुळे मी त्यांच्या घरातून हललो तर ते बरं दिसणार नाही. योग्य होणार नाही. त्यांना वाईट वाटेल, सध्या नको, पुढे पाहता येईल.” इथे स्वामी विवेकानंदांचा विवेक दिसतो. यानंतर झालेल्या गप्पांमधून हरिपद यांना स्वामीजींचे व्यक्तिमत्व उलगडत गेले. दुसर्‍या दिवशी स्वामींना त्यांनी फराळाला बोलावले, स्वामीजींनी होकार दिला. दुसर्‍या दिवशी हरिपद स्वामीजींची वाट पाहत होते. बराच वेळ झाला स्वामीजी आलेच नाहीत, म्हणून हरिपद त्यांना बघायला भाटे वकिलांकडे गेले. पाहतात तर काय, त्यांच्या भोवती गावातील अनेक वकील, पंडित आणि इतर प्रतिष्ठित यांचा मेळावा जमलेला. कोणी प्रश्न विचारात होते, कोणाचा मुक्त संवाद चालला होता. स्वामीजी चार भाषांतून सर्वांना कुशलतेने उत्तरे देत होते. या रंगलेल्या धर्मचर्चेत एकाने संस्कृतमध्ये विचारले, “धर्मासंबंधी म्लेंच्छ्  भाषेत चर्चा करणे निषिद्ध आहे. असे अमुक पुराणात संगितले आहे”. त्यावर स्वामीजी म्हणाले, “ भाषा कोणतीही असो, त्या भाषेतून चर्चा करायला काही हरकत नाही. हे सांगताना त्यांनी अनेक वेदादिकांमधील संदर्भासहित स्पष्टीकरण दिले आणि शेवटी सांगितले, हायकोर्टाचा निकाल खालची कोर्टे झिडकारू शकत नाहीत, पुराणापेक्षा वेदांचेच म्हणणे श्रेष्ठ”.

एका ब्राह्मण वकिलाने विचारले, स्वामीजी संध्या व इतरही आन्हिकांचे सारे मंत्र संस्कृत भाषेत आहेत. ते सारे आम्हाला कळत नाहीत. अशा स्थितीत ते म्हटल्याने आम्हाला काही फळ मिळेल की नाही”? स्वामीजी उत्तरले, “अलबत, तुम्ही ब्राह्मणा पोटी जन्म घेतलेला, थोडासा प्रयत्न केला तर त्या मंत्राचा अर्थ सहज समजून घेऊ शकाल. पण असा प्रयत्नच मुली तुम्ही लोक करत नाहीत. हा दोष सांगा पाहू कुणाचा?आणि अर्थ जरी कळत नसला तरी, संध्या करावयास बसता, तेंव्हा काहीतरी शुभ धर्मकर्म करीत आहोत असे तुम्हाला वाटत असते. धर्मकर्माच्या शुभ भावनेने जर ते आन्हिकं करीत असाल तर तेव्हढ्यानेच त्याचे शुभ फळ तुम्हाला खात्रीने मिळेल”.   

सर्वजण गेल्यावर स्वामीजींना हरिपद दिसताच त्यांच्या निमंत्रणची आठवण झाली. स्वामीजींनी त्यांची माफी मागितली आणि म्हणाले, “एव्हढ्या मंडळींचा हिरमोड करून येणं मला प्रशस्त नाही वाटलं. गैर मानू नका”. यावेळी हरिपद यांनी पुन्हा घरी राहायला येण्याचा आग्रह केला. तर स्वामीजींनी सांगितलं, आधी भाटे वकिलांची परवानगी घ्या. ते हो म्हणाले तर माझी काही हरकत नाही. हरिपद यांनी महाप्रयत्नाने ही परवानगी मिळवली आणि ते स्वामीजींना आपल्या घरी घेऊन गेले. हरिपद मित्र यांच्या आयुष्यातला स्वामीजींचा हा सहवास क्रांतिकारक ठरला होता.

हरिपद मित्र अगदी मॅट्रिक होईपर्यंत इंग्रजी शाळेत शिकत असल्याने त्यांचा हिंदू धर्मावरील विश्वास उडत चालला होता. कॉलेजच्या विषयांबरोबर हक्स्ले, डार्विन, मिल.टिंडॉल, स्पेन्सर प्रभृती या पाश्चात्य पंडितांचा त्यांच्या ग्रंथावरून परिचय झाला होता. अती इंग्रजी शिक्षणामुळे ते नास्तिक बनले, कशावरही श्रद्धा नाही, भक्ति नाही. सर्वच धर्मात त्यांना दोष दिसे. याच वेळी मिशनर्यांचे त्यांच्याकडे येणे जाणे सुरू झाले. ख्रिस्ती धर्म स्वीकारावा म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न केले गेले. इतर धर्माची निंदा करून वेगवेगळे डावपेच रचून, आधी ख्रिस्ती धर्मावर विश्वास ठेवा मग तो श्रेष्ठ वाटेल, मन लावून बायबल वाचा म्हणजे आपोआप श्रद्धा बसेल, असे त्यांच्या गळी ऊतरवू लागले होते मिशनरी. पण प्रमाणाखेरीज कशावरही विश्वास ठेऊ नये हे तत्व पाश्चात्य विद्येमुळेच त्यांना कळले होते आणि ते त्याच्यावर ठाम पण होते. परंतु मिशनरी आता नेमकं याच्या विरुद्धच सांगू लागले होते. शेवटी गोष्ट इतक्या ठरला गेली की, हरिपदांच्या शंका असलेल्या दहा प्रश्नांची उत्तरे द्यावीत मग बाप्तिस्मा करून ते ख्रिस्ती धर्म स्वीकारतील. परंतु सुदैवाने हरिपद यांना तीन प्रश्नांची उत्तरे मिळण्यापूर्वीच कॉलेज सोडलं आणि संसार सुरू झाला त्यामुळे हे धर्मांतर वाचलं. पण यानंतर ही त्यांचा सर्व धर्माचा अभ्यास चालूच होता. चर्चमध्ये जाणं, देवळात जाणं, ब्राह्म समाजात जाणं हे चालू होतं. तरीही सत्य धर्म कोणता, असत्य कोणता, चांगला कोणता, वाईट कोणता हे हरिपद यांना ठरवता आले नव्हते. पण कोणत्यातरी धर्मावर दृढ श्रद्धा ठेवल्यास आयुष्य सुखासमाधानाने  घालवता येईल हे त्यांना पटलं होतं. तरीही चांगल्या पगाराची नोकरी, उत्तम स्थिति असताना सुद्धा मन मात्र बेचैन होतं. शांत नव्हतं. सतत कसली तरी हुरहूर असे. स्वामीजींच्या संपर्कात आल्याने त्यांना धर्मासंबंधी योग्य मार्गदर्शन मिळाले. धर्म वादावादीत नाही. धर्म म्हणजे प्रत्यक्षा अनुभूतीची बाब आहे. ही गोष्ट पटवून देण्यासाठी स्वामीजी म्हणत, ‘मिठाईची पारख होणार ती मिठाई खाऊनच, धर्माचा प्रत्यक्ष अनुभव घ्या, एरव्ही काहीही कळणे कधी शक्य नाही’.  

धर्मजीवनाविषयी अशा प्रकारे त्यांच्या मनात अनेक शंका होत्या. अनेक संशय होते  त्या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वामीजींनी दिली होती. सत्य, धर्म आणि श्रद्धा या विषयावरच्या चर्चेतून आणखी गोष्टींचा खुलासा हरिपद यांना झाला होता. जेंव्हा जेंव्हा सवड मिळे संवाद होई तेंव्हा तेंव्हा हरिपद मित्र ही संधी घेत असत. याबरोबरच स्वामीजी त्यांना आलेले अनुभव पण सांगत.

हरिपद यांच्या पत्नी इंदुमती यांना बर्‍याच दिवसांपासून गुरुमंत्र घेण्याची इच्छा होती.पण हरिपद धर्माच्या बाबतीत साशंक होते आणि योग्य व्यक्ती भेटेपर्यंत वाट पाहूया असे त्यांनी पत्नीला सांगीतले होते.    स्वामीजींन कडून ती घेण्याचा योग आल्याने दोघं ही कृतकृत्य झाले. शिष्यत्व पत्करल्यावर स्वामीजी तीन वेळा फक्त भेटले . प्रथम बेळगावला. नंतर स्वामीजी अमेरिका प्रवासाला गेले त्या आधी आणि नंतर देहत्यागच्या सहा महीने आधी. स्वामीजींनी दीक्षा दिल्यानंतर दोघांचेही सतत स्मरण ठेवल्याचे दिसते.अमेरिकेत जाण्याआधी त्यांनी इंदुमतींच्या पत्रात लिहिले होते, “तुमचे उभयतांचे कल्याण असावे अशी प्रार्थना मी नित्या परमेश्वराला करत असतो. परमेश्वराची कृपा असेल तर मी अमेरिकेतून परत आल्यावर आपली भेट होईल. आपण परमेश्वराच्या हातातली केवळ बाहुली आहोत. याचे सदैव स्मरण ठेवा. मन सदैव शुद्ध असावे, विचार उच्चार वा आचार यापैकी कशातही अशुद्धतेचा स्पर्श होऊ देऊ नये. गीतेचे पठण करीत राहा”. अशा प्रकारे हरिपद यांना स्वामीजींचे वैयक्तिक सहवासातून दर्शन झाले होते. बोलता बोलताना स्वामीजींनी हरिपद बाबूंना आपला सर्वधर्म परिषदेला अमेरिकेला जाण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला होता.                                  

स्वामीजी आता इथला प्रवास संपवून निघाले. हरिपद यांनी त्यांना प्रेमपूर्वक निरोप दिला बेळगावमध्ये असताना शिरगावकर यांची ओळख झाल्याने जाताना त्यांनी मडगावच्या सुब्राय नायक यांच्या नावे  परिचय पत्र दिले होते. ते घेऊन स्वामीजी गोव्याकडे रेल्वेने रवाना झाले.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सावधानता… भाग ४ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ सावधानता… भाग ४ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

प्राणी मात्रांच्या सावधपणाची किती उदाहरणे द्यवी तितकी कमीच आहेत. त्सुनामी आली ,त्यावेळी प्राण्यांना त्सुनामीची आधी जाणीव  झाली होती. भूकंप होणार याची जाणीव  मानवाच्याही आधी जंगली प्राण्यांना, पशूपक्ष्यांना आगोदर होते. त्यांचे वर्तन बदलते. पाऊस येणार असल्याची जाणीव पतंग किड्यांना आगोदर होते. बर्याच संख्येने ते दिव्याजवळ येतात .निसर्गात प्राणी आणि पक्षी सावध असतातच.पण झाडांना देखील सावधपणा असतो. संवेदना असतात.हे प्रयोगाने सिद्ध झाले आहे.

हे सगळं लिहीत असताना मला घरातलेच अनुभव आठवले. आमच घर शेतात एकाकी अस होत.टाँमी आणि बंड्या असे दोन कुत्रे, एक जयू गाय,टिट्या, गोट्या असे दोन  भाऊ भाऊ बोके,पोपट आणि आम्ही असे आमचे कुटुंब होते. बर्याच वेळा शेजारच्या पोल्ट्रीतील खाद्य खाण्यासाठी उंदीर यायचे.आणि उंदरांना धरण्यासाठी सापही यायचे. साप आला की, कोंबड्या सावध व्हायच्या.कोंबड्यांचा आरडाओरडा आणि फडफडाट  चालू व्हायचा. आणि आम्हाला सापाची जाणीव करून द्यायच्या.भोवती शेती असल्याने साप, विंचू, सरडे, मुंगूस ही असायचे. आमचे दोन्ही कुत्रे साप दिसला की वेगळा आवाज काढायचे. चोर दिसला की वेगळा आवाज काढायचे. त्यांच्या टोनिंग वरुन  आम्हाला सावध करायचे. दोन्ही बोके कुठेतरी दबा धरून बसलेले दिसले की, ओळखावे. इथे पाल, उंदीर काहीतरी नक्की आहे. कठून शिकले असतील हा सावधपणा?कित्येकदा घरात माझ बाळ रडत असलं तरी आमचा टाँमी मला कूं कूं करून सांगायचा .सावध करायचा.”लक्ष्य आहे की नाही, बाळ रडतय”.बाळाला तिर्हाइतानं कुणी घेतलेल  त्याला आजिबात आवडायचं नाही. परका कोणी घेतो की काय ,याबाबत तो फार सावध असायचा.त्याच्या सावधपणाचे किती कौतुक करावे, आणि किती अनुभव सांगावेत, तितके कमीच  आहेत. आयुष्यभर त्यांच्या उपकाराची फेड होणार नाही.

अनेक उपकरणे, अनुभव, प्रयोग यांच्या सहाय्याने प्राणी वर्तन, त्यांच्यातील सजगता, सावधानता यांचा अभ्यास करता येऊ लागला आहे. व प्राण्यांचे मानसशास्त्र ही एक नवीन शास्त्रशाखा उदयाला आली आहे. याचा प्रत्येकाने जरूर अभ्यास करावा,असे वाटते.

– समाप्त – 

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सावधानता… भाग ३ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ सावधानता… भाग ३ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

जमिनीवर रहाणार्या प्राण्यांचे कान हे ध्वनी ग्रहण करण्यास खूपच कार्यक्षम  असतात. हरणाच्या बाबतीत सांगायचे तरंतो प्रत्येक कान स्वतंत्रपणे हालवू  शकतो. स्थिर किंवा विश्रांतीत असताना देखील प्रत्येक कानाकडून मिळालेल्या ध्वनी लहरीची तुलना करून ते ध्वनीचा स्रोत निश्चित करु  शकतात. त्याच्या श्रवण शक्तीची तुलना उपग्रहाशी केली जाते. माकडे , जिराफ, झेब्रे, हे प्राणी समूहाने रहातात. त्यापैकी त्यांचा एक नेता किंवा प्रमुख असतो. तो शत्रूशी सामना करून इतरांचे रक्षण करतो.बाकी सारे त्यांच्या हुकमतीखाली रहातात. त्यांच्या तील सामाजिक वर्तनही उच्च दर्जाचे असते. जंगलात वाघ किंवा सिंह यांची चाहूल लागली की, झाडावरील माकडे विचित्र आवाज काढून त्याची पूर्वसूचना जमिनीवरील प्राण्यांना  देतात. बाकीचे  प्राणी सावध होऊन पळू लागतात. वाघ किंवा सिंह दुरुन एखादे सावज पक्के करतो. आणि त्याचाच पाठलाग करून ते सावज पकडतो.मग बाकीचे प्राणी पळायचे थांबतात. त्यांना समजत की,आपल्या वरच संकट टळल आहे. शिकार झाली की, तरस हा आयत्या  शिकारीवर जगणारा प्राणी सावधानपणे तयारच असतो. एकदा शिकार झाली की, पुन्हा भूक लागेपर्यंत समोरुन प्राणी गेला तरी मारला जात नाही. शिकार कशी करावी, कसे खावे,हे पिल्ले आईकडून शिकतात.

हत्ती हा पृथ्वीवरील सर्वात मोठा व ताकदवान प्राणी. ते कळपाने रहातात. अन्नाच्या शोधात सतत स्थलांतर करीत असतात.आफ्रिकन हत्ती हे भडक डोक्याचे असतात. हत्तीना मुसळधार पावसाची चाहूल सर्वांच्या आधी लागते. दोनशे चाळीस  कि. मि.अंतरावरुनही हत्तीना  मुसळधार पावसाची चाहूल लागते. आणि ते अचानक आपली दिशा बदलतात.साधारणपणे हत्तीच्या दिशेने वादळी पाऊस येणार असल्याची माहिती वेधशाळेकडून संशोधकांना मिळाली., हे हत्तीचे एक आश्चर्यजनक सावधपणच नव्हे काय?

अस्वल हा प्राणी कधी एक एकटा किंवा दोघे असे रहातात. वेळोवळी ते एकमेकांची जागा व्यापतात. घाबरलेले अस्वल ओरडत नाही तर जमिनीवर आपटत राहून  फुत्कार टाकतात. जेव्हा ते रागावतात ,तेव्हा ते खालचा ओठ बाहेर काढून कान मागे सारतात.आणि रागाने एक प्रकारे धमकावतात. बर्याच वेळ मागील दोन पायावर उभे राहून सर्व दिशांना मान फिरवून हुंगत रहातात. संवेदनशील होऊन आपले भक्ष्य पकडतात. आणि संकटही ओळखतात.गेंडा हा प्राणीही जंगलात रहातो. त्याची द्रुष्टी तितकीशी ताकदवान नसते. गेंडा घुसखोरांना हाकलण्यासाठी त्यांच्यामागे पळत रहातो. कधीकधी झाडाझुडुपांवर आपटलाही जातो. ठराविक  ठिकाणी तो मूत्र व विष्ठा विसर्जन करून आपले क्षेत्र तो पक्के करतो.दूर  कोठे गेला तरी पुन्हा तेथेच येऊन त्याच ठिकाणी तो मूत्र व विष्ठा विसर्जन करतो. आपल्या स्थानाबाबत पक्का जागरुक असतो.कुत्रा हा प्राणी हजारो वर्षांपासून माणसाच्या संपर्कात आहे. तो इमानदार  राखणदार आणि शिकारी गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पाळतात.त्याच्या घ्राणेंद्रियांची क्षमता माणसाच्या आठशेपट जास्त असते. त्यामुळे बाँब शोधक पथकातही तो काम करतो. रक्तदाब ,रूदयरोग , मानसिक ताणतणाव अशा व्याधींवर डाँग थेरपी म्हणूनही त्याचा उपयोग केला जातो.त्यासाठी आता अभ्यासक्रम तयार केले आहेत.वैदिक वांग्मयात देखील कुत्र्याचे उल्लेख आहेत. कित्येकदा नको म्हणून दूरवर नेऊन सोडलेले  कुत्रे दोन–तीन दिवसांनी परत आपल्या दारी आल्याचे आपण पहातो. अशावेळी  त्या सोडणार्या निर्दय माणसाचा राग येतो.केवळ वासाच्या आधारे ते आपले ठिकाण  शोधून काढतात. मांजर या प्राण्याबद्दल सांगायचे तर ते इमानदार नसते.पण वासाने त्याला आपली शिकार समजते. आणि जाणीव झाली की , तासनतास ते सावजाची वाट पहात बसते.

क्रमशः…

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जागतिक टपाल दिन…! ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

? विविधा ? 

☆ जागतिक टपाल दिन…! ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

टपाल आणि माझं नातं कधी जुळलं ते आठवत नाही. पण गावात जुन्या ग्रामपंचायतीच्या बाहेर पोस्टाची लाल टपाल पेटी अडकवलेली होती.शाळेला जाता जाता आम्ही मारुतीच्या मंदिरात खेळायला थांबायचो. कुतुहल म्हणून शेजारच्या ग्रामपंचायतीच्या व्हरांड्यातील खिडकीला अडकवलेली टपाल पेटी न्याहाळायचो कुणीतरी खिडकीवर चढून पेटीचे झाकण उघडझाप करायचं.कुणीतरी आत हात घालून काय आहे का पहायचं.कधी हात पेटीत अडकवून घ्यायचो.कुणी ती पेटी वाजवायची.कुणीतरी ओरडलं तर धूम ठोकायची.असा खेळ सुट्टीत नेहमीच चालायचा.यात महत्वाची कागदं येतात जातात असं कुणीतरी सांगून जायचा. मग हळूहळू थोडी माहीती होत गेली.

…आमच्या वाड्यातला गोरापान आणि घाऱ्या डोळ्याचा बापू तात्या(बापू वाघमारे) सायकलीला पिशवी अडकवून दररोज सकाळी करगणीला जायचा आणि काही तासानं परत यायचा. असं नेमानं घडायचं. त्याची जायची आणि यायची वेळ एकच असायची. शाळेपुढून त्याचं जाणं येणं असायचं. त्यामुळं बापू तात्या करगणीतून रोज पिशवीतून काहीतरी आणतो आणि घेऊन जातो याचंही कुतुहल असायचं. बापू तात्या करगणीतून आलेला दिसला की पत्रं आली असं ऐकायला मिळायचं.

गावात पाटलाच्या वाड्याजवळ असणाऱ्या अत्ताराच्या घरात पोस्ट ऑफिस होतं. तिथं हुसेन अत्तार पोस्टमास्तर म्हणून असायचे. त्यांच्याच घरातल्या एका खोलीत पोस्ट असायचं. उंचपुरा,मोठ्या डोळ्यांचा,खड्या आवाजाचा आणि हसऱ्या चेहऱ्याचा हुसेनभई आजही डोळ्यापुढून हटता हटत नाही. हुसेनभई नेहमी पोस्टाची महत्वाची पत्रे न चुकता बापू तात्यांकडून गावातल्या वाड्यावस्त्यावर पोहचवायचे. कुणाला नोकरीचा कॉल आला,कुणाची मनीऑर्डर आली सगळी खबर पोस्ट मास्तर जवळ असायचीच. पोस्टानं आमचं महत्वाचं यायचं आहे,आलं म्हणजे सांगा -असं अवर्जून तरुण पोरं हुसेन मास्तरला आठवणीनं सांगत रहायची. रोज बापू तात्यालाही विचारत रहायची. पोस्ट असलेल्या या खोलीत आलेल्या पोस्टावर जाडजुड असा शिक्का काळ्या शाईत बुडवून मारलेला आवाज बाहेर ऐकू यायचा. त्यावेळी १५ पैशाचं जाड पोस्टकार्ड मिळायचं त्यावर रुबाबदार पट्टेरी वाघाचं चित्र असायचं.

चौथी पाचवीत होतो तेव्हा सावंताची बायना काकू तिच्या मुंबईतल्या पोरीकडं साधं पोस्टकार्ड लिहून पाठवायला सांगायची. ती बरीच लांबड लावत लिहायला सांगायची पण पत्रावर थोडंच लिहायला जागा असायची. पत्ता लिहून पोस्टात टाकायला द्यायची. कधी मुंबईहून पोरीचं पत्र आलं की वाचून दाखवायला हाक मारून बोलवायची.

खरंतर इथूनच असं पोस्टाचं नातं जुळत गेलं.मी ही माझ्या मुंबईच्या मोठ्या आत्त्याबाईला पत्र पाठवायचो. गावाकडची ख्यालीखुशाली कळवायचो. तिचंही पत्र यायचं. पाचवीत असताना माझ्या मुंबईच्या याच इंदिरा आत्याने पोस्टाने जाड  आणि मजबूत असे पाठीवर अडकवायचे कापडी दफ्तर पाठविले होते. ते दफ्तर पाठीवर घेऊन किती मिरवलं होतं मी.

ती कधी कधी मनीऑर्डर करून पैसेही पाठवायची. पैशातून पाटी-पुस्तकं-कपडे घ्यायला सांगायची. खूप शिक म्हणायची. तिचा आणि माझा पोस्टामुळंच हा दुवा जुळत राहीलेला. ती आता नाही पण तिच्यामुळंच खरंतर शिक्षणाची गोडी लागली होती. तिनं रुजविलेल्या शिक्षणाच्या जिद्दीमुळंच मी शिक्षण घेत राहीलो. माझी तीन पुस्तके प्रकाशित झाली. M.Ed., SET, झालो. आणि चार विद्यापिठाच्या Ph.D.साठी निवडलोही गेलो. माझ्या बालपणीच्या प्रत्येक आठवणीत पोस्टाचा आणि मुंबईच्या आत्याबाईचा ठेवा चिरंतन आहे. माझ्या निंबवड्याच्या रेखा आत्यालाही मी साधं पोस्टकार्ड लिहून पाठवायचो.

कधी लाल शाईनं लिहलेला कागद बापूतात्या घेऊन यायचा. ती तार असायची. लाल अक्षरातलं पत्र बघितलं की बायकांची रडारड सुरू व्हायची. गलका व्हायचा. कुणीतरी गेल्याची खबर असायची. कुणीतरी शिकलं सवरलेलं ती तार वाचून दाखवायचं. तार आलीय म्हंटलं की सगळे धसका घ्यायचे.

मी सातवीत असताना एकदा गावात येणाऱ्या पेपरमधले कोडे सोडवून पोस्टाने पाठवले होते. काही दिवसांनी बापूतात्याने पार्सल आले आहे,पोस्टातून सोडवून घ्या- म्हणून निरोप दिलेला. बक्षीसाचा रेडीओ पोस्टाने माझ्या नावे आला होता. त्याचं भारी कौतुक माझं मलाच वाटलं होतं. हुसेनभईने दीडशे का दोनशे रुपये भरून तो सोडवून घ्यायला सांगितले होते. पण तेवढे पैसे नव्हते. आमच्या आप्पाने कुणाकडून तरी पैसे गोळा करून दोन दिवसांनी तो रेडीओ सोडवून घेतला होता. ‘खोक्यात काहीही असेल,अगदी दगडंही,आमची जबाबदारी नाही’ असं हुसेनभईने अगोदरच सांगून बक्षीसाची हवाच काढून घेतली होती. पण खोक्यात चांगला मर्फी कंपनीचा रेडीओ आला होता. सेल घालून सुरुही झालेला. केवढा आनंद झाला होता. रेडीओ सुरु करून गावातनंही मिरवला होता. आप्पा सकाळ संध्याकाळ मोठ्या आवाजात तो रेडीओ लावून घराबाहेरच्या दिवळीत ठेवायचा. पुढं कितीतरी दिवस तो साग्रसंगीत सोबत वाजत राहीलेला.

पुढं हळू हळू काही पुस्तकं पोस्टानं मागवू लागलो. रंगपेटीही एकदा पोस्टाने आली होती. दिवाळीच्या वेळी पोस्टकार्डवर आकर्षक ग्रिटिंग कार्ड रंगवून ते मित्र व नातेवाईकांना पाठवलेली अजूनही आठवते. पुढं कॉलेजला असताना घरून मनीऑर्डर यायची. शिक्षणासाठी तोच आधार असायचा. आईआप्पाला पत्रातून ख्यालीखुशाली पाठवायचो. गावाकडून माझे दोस्त कधी गुंड्या,कधी रावसाहेब पत्र पाठवायचे. शाळेतला दोस्त मधू पुकळे काम शोधण्यासाठी मुंबईला गेला होता तेव्हा आठवणीनं पत्र मुंबईतनं पाठवायचा. पिक्चरमधल्या गोविंदाला भेटलेला किस्सा पत्रातून त्याने कळवला होता. रक्षाबंधनाच्या दोन तीन दिवस आधी मुंबईच्या अंजूताईच्या राख्या न चुकता पोस्टाने येत रहायच्या.जवळच्या कितीतरी ज्ञात अज्ञातांनी पोस्टाने नोटस्,पुस्तके आणि मैत्रीची पत्रे पाठवलेली अजूनही आठवतात.नोकरीचा कॉलही पोस्टाने आलेला आजही मी जतन करून ठेवलाय. सिने अभिनेते स्व.दादा कोंडके यांना पाठवलेले पत्र अजूनही लक्षात आहे. ते पत्र त्यांना मिळालं का नाही काहीच कळलं नाही. कॉलेज जीवनात कॉलेजमधल्या एका मैत्रीणालाही पाठवलेले पत्रही तिला पोहचले का नाही काहीच कळलं नाही. ‘आमचा बाप आणि आम्ही ‘या पुस्तकाचे लेखक डॉ.नरेंद्र जाधव यांना माझे

‘काळजातला बाप ‘ पुस्तक दोनवेळा पाठवले होते. दोन्ही वेळा चुकीचा पत्ता म्हणून परत आलेले ते पार्सल मी अजूनही तसेच पॅकिंगमध्ये जपून ठेवलंय.

…अशा कितीतरी आठवणीं पोस्टाशी नाते घट्ट करणाऱ्या.. आजही त्या मनाच्या पोस्ट पाकीटात जतन करून ठेवल्यात पोस्टातल्या बचत खात्यासारख्या…!

आज पोस्ट खात्यात बरेच बदल झालेत पण पोस्टाशी असलेला आठवणींचा सिलसिला अजूनही माझ्या गावातल्या पोस्टमन बापू तात्या आणि हुसेन मास्तरच्या भोवती स्पीड पोस्ट सारखा पिंगा घालत राहतो…!

(आगामी संग्रहातून..)

© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर

मु.पो.बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

९४२११२५३५७…

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सावधानता… भाग २ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ सावधानता… भाग २ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

जलचर  म्हणजे माशांचे प्रकार, कासव ,  मगरी यांचे सावधपण वेगळे असते. शार्क माशांच्या कातडीमधे विद्युत वहन होते. चुंबकीय क्षेत्रामुळे त्याचे व्होल्टेज तयार होते.व त्यानुसार तो डाव्या उजव्या बाजूला जाऊन दिशा ठरवतो.तसेच व्हेल मासा जेव्हा शंभर – शंभर कि. मि. प्रवास करतो तो एक डिग्रीसुद्धा इकडे तिकडे न होता ,सरळ रेषेत प्रवास करतो. याबद्दलचे कोडे अजूनही उलगडलेले नाही. सील सारखे सस्तन जलचरसुद्धा चुंबकीय  क्षेत्राचा वापर करतात. चुंबकीय क्षेत्रात थोडा जरी बदल झाला तरी तो त्यांच्या लक्षात येतो.आँक्टोपस आपले अवयव कसेही  वाढवतो आणि सावज पकडतो. तारा मासे विषारी द्रव सोडतात. समुद्री गाय म्हणजे अवाढव्य जलचर! सात सात तास अखंड समुद्रातील वनस्पती खात असतात.व ताशी पाच मैल वेगाने  फिरत असतात. मगरी आपली  अंडी मऊ भुसभुशीत संरक्षित जागेत व डोहाच्या ठिकाणी घालून ती मातीने गाडून त्याची राखण करतात. अंड्यातून पिल्ले बाहेर आली की पोहायला सुरुवात करतात. बदके किंवा राजहंसही एखाद्या प्राण्यापासून धोका आहे असे कळताच त्यावर ते फुत्कारतात.आणि अत्यंत आक्रमक होतात.काही जीवांना उपजतच द्न्यान असते. बदकाची पिल्ले अंड्यातून बाहेर पडली की,लगेच दाणे टिपायला लागतात. आकाशात घार दिसली की कोंबडी वेगळा आवाज काढून आपल्या पिलांना जवळ बोलावते.आणि आपल्या पंखाखाली घेऊन त्यांचे रक्षण करते.या सावधपणाचे वर्णन कसे करावे?

पक्ष्यांच्या बाबतीत सांगायचे तर, पक्षी स्थलांतर ही अनाकलनीय आणि विस्मयकारक घटना आहे असे म्हणावे लागेल. उत्तर ध्रुवावरील (सैबेरिया)भागात थंडी सुरू झाली की, खाद्याच्या तटवड्यामुळे अनेक पक्ष्यांचे थवेच्या थवे स्थलांतर करू लागतात. एका वर्षात ३६०००कि.मि.प्रवास म्हणजे उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव आणि पुन्हा उत्तर ध्रुव असा न चुकता करतात आणि  रात्री दाट पानांंमधे विश्रांती घेऊन स्वसंरक्षण करतात.अनेक पक्षी आपली विष्ठा पातळ आवरणात ठेवून ,विसर्जन करुन ,घरटे साफ ठेवतात. पिलांना अन्न भरवून ती स्वावलंबी होईपर्यंत सावधपणे त्यांच्या पाठीशी रहातात.सुगरण पक्ष्याचे तर किती कौतुक करावे तितके कमीच.! हिवाळ्यात थंडीची पूर्वसूचना ते लोकांना देतात. कायम थव्याने राहून ,घरटीही मोठ्या संख्येने बांधून, नवीन वसाहतच स्थापन करतात. धोका उत्पन्न झाल्यास चिट् चिट् असा आवाज काढून संपूर्ण वसाहतीला धोक्याचा इशारा देतात. नरपक्षी घरट्याचा पाऊण भाग विणतो.मादीला घरटे पसंत पडले की, मग तो अस्तर लावून घरटे पूर्ण करतो.अशी चार पाच घरटी बांधून कुटुंब वाढवतो.

घरटी बांधताना जमिनीपासून तीस मिटर उंचीवर व घरट्याखाली पाणी असेल अशा  ठिकाणी  किंवा काट्याच्या बाभळीच्या झाडावर अशा निर्धोक जागी घरटे बांधणे पसंत करतो.घरटे बांधताना देखील सुरुवातीला नळीचा आकार ,आतमध्ये  कधी जोडघरेही असतात. जेणेकरुन मोठा पक्षी  आत जाणार नाही. ही सावधानताच नव्हे काय?

सुगरणीवर अनेकांनी कविताही केल्या आहेत. बहिणाबाई तर म्हणतात, “अरे खोप्यामधी खोपा , सुगरणीचा चांगला,एका पिलासाठी तिने जीव झाडाला टांगला. किती छान!

क्रमशः…

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares