मराठी साहित्य – विविधा ☆ महिना अखेरचे पान – 9 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

महिना अखेरचे पान – 9 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्रावणातील इंद्रधनुच्या कमानीखालून पुढे सरकत सृष्टीने भाद्रपदाच्या अंगणात पाऊल टाकलेले असते. कॅलेंडरवरील ऑगस्ट चे पान बाजूला सारून सप्टेंबरचे पान झळकू लागते. एकीकडे ऑगस्ट महिन्याला टा टा बाय बाय करत असताना दुसरीकडे ‘कम सप्टेंबर’ चे स्वर ऐकण्यासाठी कान आतुर झालेले असतात. हे स्वर हवेत विरतात ना विरतात तोच लेझिम, झांज पथके सरावासाठी बाहेर पडतात आणि अवघा परिसर दुमदुमवून टाकतात. गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते सक्रीय होतात आणि पावती पुस्तकाना पाय फुटून घराघरांचे उंबरे झिजवू लागतात. गणेश मूर्तींवर अखेरचा हात फिरवणा-या मूर्तीकारांची लगबग चालू असते. इकडे गौरी बरोबर घरात प्रवेश मिळावा म्हणून गौरीची रोपे दाटीवाटीने उभी असतात. प्रत्येक फुलझाडाला बहर आलेला असतो. जरा बाहेर नजर टाकली तर पांढ-या, पिवळ्या, तांबड्या, निळ्या, गुलाबी अशा विविध रंगांनी बागा, माळरान नटलेले दिसतात. श्रावणातील उरलेल्या जलधारा अंगावर ऊन घेण्यासाठी अधूनमधून येत असतात. अशा या मंगल वातावरणात श्रीं चे आगमन होते. आरत्या आणि भक्तीगीतांचीचढाओढ सुरू होते. अकरा दिवसांचा मुक्काम आटोपून, पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आमंत्रण स्विकारून, गणराय लाटांवर आरूढ होऊन बघता बघता दृष्टीआड होतात. सजावटीची टेबले आणि भिंती रिकाम्या करताना मन उदास होत असते.

या भाद्रपद म्हणजेच सप्टेंबर महिन्यात असे काही दिवस असतात ज्यांना राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय महत्व आहे. आपण पाच सप्टेंबर हा सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून पाळतो. याच दिवशी स्वामी विवेकानंद यांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांची पुण्यतिथि असते. 14 सप्टेंबर  1949 ला हिंदी भाषेला अधिकृत भाषा म्हणून आपल्या संसदेने मान्यता दिली. तेव्हापासून 14 सप्टेंबर हा हिंदी दिन आहे. 15 सप्टेंबर हा अभियंता दिन म्हणून साजरा करून भारतरत्न एम्. विश्वेश्वरय्या यांच्या कार्याचे स्मरण आपण करत असतो. शिवाय 17 सप्टेंबरला पारंपारिक पद्धतीने विश्वकर्मा दिनही साजरा होतो. मराठी माणसासाठी महत्वाची घटना म्हणजे मराठवाड्याची निजामशाहीतून मुक्तता. तो दिवस ही 17 सप्टेंबर हाच आहे. याशिवाय शेगावचे संत गजानन महाराज यांची पुण्यतिथि व संत मुक्ताबाई यांची जयंती भाद्रपद महिन्यातच असते.

आंतरराष्ट्रीय स्तरावरही सप्टेंबर महिन्यात काही दिवस विशेष म्हणून साजरे केले जातात. चांगल्या उत्पन्नाद्वारे गरीबी कमी करणा-या नारळाच्या पिकाचे महत्व जाणून 2 सप्टेंबर हा नारळदिन म्हणून साजरा केला जातो. सप्टेंबर 12 हा पालक दिन, 15 हा लोकशाही दिन, 16 हा ओझोन दिवस, 18हा बांबू दिवस असे साजरे होत असतात. उद्देश एकच, त्या त्या विषयाचे महत्व सर्वांना समजावे व तिकडे लक्ष वेधून घ्यावे. याप्रमाणेच सप्टेंबर 22 हा कॅन्सर पेशंट कल्याण दिन, 23 सप्टेंबर विषुव दिन, 26 हा कर्णबधीर दिन व पर्यावरण रक्षण दिन तर 27 सप्टेंबर हा पर्यटन दिन म्हणून ओळखला जातो. अशा विविध कारणांसाठी दिवस साजरे करून समस्या, वैशिष्ट्ये, आठवणी यांकडे विशेषत्वाने पाहिले जाते.

सणासुदीचे दोन महिने यथेच्छ ताव मारून श्रावण, भाद्रपद… ऑगस्ट-सप्टेंबर… आता जरा सुस्तावलेले असतात. आनंदाचे एक पर्व काही काळासाठी थांबलेले असते. त्यातून बाहेर पडताच स्मरण होते ते पूर्वजांचे. पितरांचे पुण्य स्मरण करून त्यांच्या शांती मिळावी साठी प्रार्थना आणि त्यांच्या आशिर्वादाची अपेक्षा व्यक्त करण्याचा पितृपंधरवडा श्रद्धेने पाळला जातो. सर्वपित्री अमावस्येची रात्र संपून नवरात्रीचा जागर करण्यासाठी मन पुन्हा उभारी घेते आणि सर्व अनिष्टांचे उल्लंघन करण्यासाठी दस-याच्या सोनेरी सणाची वाट पहात असते.

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नवरात्र…नवा विचार ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ नवरात्र…नवा विचार ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

नवरात्राची सुरवात म्हणजे घटस्थापना! नवरात्री चा हा उत्सव असतो मांगल्याचा, उत्साहाचा. अमरावती मध्ये तर ह्या सगळ्या नऊ दिवसांना सोहोळ्याचं रुपं येतं. अशा उत्सवांमुळे घरोघरी, गावोगावी चैतन्याचं वातावरण प्रस्थापित होतं.

नवरात्राचे नऊ दिवस म्हणजे ह्या देवीरुपी शक्तीची निरनिराळी रुपं, वेगवेगळे साज आणि कर्तृत्वाचे झळाळते तेज ल्यायलेले ते मुखवटे ह्यावर नजर पडली तरी दिपून जाते ती नजर.

नवरात्रात घटस्थापनेपासून ते दस-यापर्यंत नऊ दहा दिवस उत्साहाचे आणि लगबगीचे. अमरावती आणि यवतमाळ ह्या दोन्हीही गावांमध्ये नवरात्राचा अनुपम सोहळा हा असतो पण त्याचं स्वरूप मात्र अगदी वेगवेगळं.

अमरावती मध्ये अंबादेवी आणि एकवीरादेवी ह्यांची जागृत देवस्थानं आहेत.आणि अमरावती मध्ये गुजराती समाज भरपूर असल्याने त्यांचा नऊ दहा दिवस टिप-यांचा आणि गरब्याचा खेळ असतो. त्यामुळे संपूर्ण अमरावती नवरात्रमय झालेली असते.

सध्या दोन वर्षांपासून कोरोना प्रादुर्भावामूळे सगळे सणंवार साजरे करण्याची गणितचं बदललीत. परंतु खूप बदाबदा कोसळून गेल्यानंतर उघडीप मिळाल्यानंतर झपाट्याने वर्दळीला सुरवात होते तशी स्थिती ह्या नवरात्रात बघायला मिळतेयं.नवरात्रात अंबादेवी व एकवीरा देवीच्या दरबारात खूप मोठमोठी दिग्गज कलाकार मंडळी आपली कला वा आपली गायकी पेश करतात. खूप दुरदुरून बाहेरगावांहून देवीच्या दर्शनासाठी लोकं गर्दी करतातच. देवीरोडवर जणू जत्राच भरलेली असते.

नवरात्रात आमच्या घरीही नवरात्र असतं.रोज नऊ दिवस देवीला फुलांची माळ आणि अखंड नंदादीप असतो.नवरात्र उठताबसता म्हणजेच घटस्थापना आणि दस-याला जेवायला सवाष्ण असते.

यवतमाळ चे नवरात्र दुर्गादेवींच्या प्रतिष्ठापनेमुळे प्रसिद्ध आहे.खूप लांबूनलांबून लोक यवतमाळला देवी आणि त्यांच्याजवळील आरास, देखावे बघायला गर्दी करतात. असंं म्हणतात की बंगालमधील कलकत्त्यानंतर दुर्गादेवींच्या उत्सवात दुसरा क्रमांक यवतमाळचा लागतो. यवतमाळला जवळपास दीडदोनशे दुर्गादेवींची स्थापना केली जाते आणि विशेष म्हणजे सगळ्या मूर्ती एकसे एक सुंदर,तेजःपुंज पण तरीही सगळे मुखवटे एकसारखे न दिसता अगदी वेगवेगळे.

..नवरात्रात कुणी नऊ दिवस ऊपास, कुणी नऊ दिवस मौनव्रत तर कुणी नऊ दिवस अनवाणी राहून आपली श्रध्दा प्रकट करतात.

संपूर्ण नवरात्रभर  महिला वर्ग वेगवेगळ्या रंगांच्या साड्या परिधान करतात. अमरावती चे कपडामार्केट खूप प्रसिद्ध. नवरात्रात येथे कपड्यांच्या व्यापारात खूपमोठी उलाढाल होते.

ह्या नऊ दिवसाच्या देवीच्या नवरात्रात स्त्रीयांना, कुमारिकांना देवीचे प्रतीक समजून सन्मान दिल्या जातो, त्यांचे पूजन केले जाते.

पण खरतरं नवरात्रातच फक्त देवीलाच मखरात बसवायचे असे नव्हे तर देवीरुपात आपल्या अवतीभवती असणाऱ्या महिलांनाही तेवढाच सन्मान प्रदान करणे हे जास्त संयुक्तिक.

अर्थातच महिलांचा आदर करणारे असतात त्याचप्रमाणे महिलांना कस्पटासमान समजणारे लोकही असतात.काही महिलांना न्याय देणारे असतात तर काही फक्त महिलांवर अन्याय करायलाच जणू जन्म घेतात. काही जणं महिलांवर कौतुकाची बरसात करतात तर काही जणं फक्त महिलांच्या पायाखाली निखारेच फुलवितात. शेवटी काय तर हो उडदामाजी काळेगोरे हे असणारच.

नुसता नवरात्र म्हणून महिलांचा उदोउदो करायचा की संपूर्ण आयुष्य महिलांकडे देवीच्याच आदरयुक्त नजरेनं बघायचं ह्याचं प्रत्येकाचं समीकरणचं वेगवेगळं असतं बघा.

मी मागे केलेल्या रचनेने आजच्या पोस्ट ची सांगता करते. ती रचना खालीलप्रमाणे.

फक्त नवरात्र आले की मगच मानसिकता बदलायची,

      सवय आहे ही माणसा तुझी फार जुनी 

देवी समजून नऊ दिवस पुजायचे

आणि मग वर्षभर तिला गृहीत धरून चालायचे

त्यापेक्षा नको मानूस तिला देवी,नको बसवूस मखरात

अरे ती फक्त आधी माणूस आहे हे ठेव आधी ध्यानात

एकदा का तिला देवीत्व बहाल केलंस की

तुझं मात्र सगळं पुढील खूप सोप्पं झालं

देवीत्वाच्या ओझ्याखाली बिचारीचे मनोगत

मौनव्रताने अलगद मूक झालं 

बनविलीस तिला मूर्ती त्यागाची, तुझी झोळी मात्र कायम ठेवलीस भरलेली 

त्याग, समर्पण करता करता ही मात्र रिक्त होऊन स्वतः थकलेली. म्हणून माणसा देवीत्व बहाल करायच्या ऐवजी आधी तिला माणूस म्हणून जाणायला शीक

समजून उमजून तिला घेतलसं तर स्त्री च्या अस्तित्वाचे संतुलन होईल नीट, अस्तित्वाचे संतुलन होईल नीट.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कोकणच्या विकासासाठी बॅरिस्टर नाथ पै यांचे योगदान… ☆ सौ. तेजल गुरुनाथ ताम्हणकर ☆

25 सप्टेंबर…बॅ. नाथ पै यांचा जन्मदिवस निमित्त :

Image result for फोटो बॅरिस्टर नाथ पै

? विविधा ❤️

☆ कोकणच्या विकासासाठी बॅरिस्टर नाथ पै यांचे योगदान… ☆ सौ. तेजल गुरुनाथ ताम्हणकर ☆

कोकणच्या विकासासाठी बॅरिस्टर नाथ पै यांचे योगदान

‘पाहू चला रे हिरवे डोंगर, हिरवी झाडी,

कोकणात आली बघा ही रेल गाडी.’

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1996 साली सर्वप्रथम कोकण रेल्वे अवतरली. तिच्या स्वागतासाठी लिहिलेली ही कविता! कोकण रेल्वेच्या रूपाने एक नवा अध्याय कोकणवासियांच्या आयुष्यात सुरू झाला. हा अध्याय बॅ. नाथ पै यांच्याच स्वप्नाचा एक भाग होता.  बॅ. नाथ पै यांनी कोकण रेल्वेचे स्वप्न पाहिले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ते सत्यात उतरवले. असे म्हणतात ‘जर स्वप्न द्रष्ट्या माणसाने पाहिले तर स्वप्न सत्य बनून जाते’ असा द्रष्टा नेता म्हणजेच बॅ. नाथ पै! तत्कालीन रत्नागिरी म्हणजे नररत्नांची खाण असलेल्या जिल्ह्यातील चमकता हिरा!

बॅरिस्टर नाथ पै यांचा जन्म 25 सप्टेंबर 1922 रोजी वेंगुर्ले या ठिकाणी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण वेंगुर्ल्यातच झाले. उर्वरित शिक्षण बेळगाव आणि पुणे या ठिकाणी झाले आणि उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी कायद्याचा व संसदीय लोकशाहीचा अभ्यास केला.

बॅरिस्टर नाथ पै यांचे बालपण कोकणात गेल्यामुळे त्यांनी येथील जीवन अनुभवले होते. परशुरामाच्या या भूमीला निसर्ग सौंदर्याचे भरभरून दान लाभले असले तरी दारिद्र्याचे चटके तितकेच सोसावे लागतात, हे नाथांनी पाहिले होते. कोकणचा समृद्ध निसर्ग डोळ्यात साठवत ते लहानाचे मोठे झाले. या भूमीने त्यांना संस्काराची शिदोरी दिली. येथील समुद्रकिनाऱ्यांनी त्यांच्या विचारांना सखोलता आणि भव्यता दिली. समुद्राच्या गाजेचे गांभीर्य आणि माधुर्य त्यांच्या वाणीत होते. उंच उंच माड फोपळी त्यांच्या कर्तुत्वाला साद घालीत. त्यांनी त्यांच्या व्यक्तीमत्वाला ताठ कणा दिला, त्यांच्यामध्ये महत्त्वाकांक्षेचे बीज रोवले. रानावनातील फुलांनी कलासक्तपणा दिला. एकीकडे निसर्गाचे श्रीमंतरूप आणि दुसरीकडे कमालीचे दारिद्र्य असा विरोधाभास त्यांनी लहानपणीच अनुभवला. ‘येथील लोकांचे दारिद्र्य दूर करण्याचा मी प्रयत्न करीन’ अशी त्यांनी भीष्मप्रतिज्ञा केली. बॅरिस्टर नाथ पै यांनी कोकणचे पालकत्व स्वखुशीने स्वीकारले व निभावलेही!

बॅरिस्टर पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून मायदेशात परत आल्यावर नाथ पै राजकारणात उतरले. राजापूर मतदारसंघातून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढविली. निवडून आल्यावर त्यांनी केवळ मतदारसंघाचेच नेतृत्व केले नाही तर देशाचेही नेतृत्व केले. लोकशाहीच्या या पुजाऱ्याचे, समाजवादाच्या वारकऱ्याचे कोकणवर फार मोठे ऋण आहे. समाजवादी चळवळीत आघाडीवर असलेल्या या कोकणपुत्राने समाजवादी पक्षातर्फे निवडणूक लढविली. कोकणविषयक प्रश्नांची जाण आणि अमोघ वाणीने त्यांनी साऱ्या मतदारांची मने जिंकून घेतली. ‘नाथ येती घरा तोची दिवाळी दसरा’ अशी कोकणवासियांची अवस्था होती. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सत्ताधारी पक्षाचे मोरोपंत जोशी होते. त्यांच्याशी टक्कर देणे ही सामान्य बाब नव्हती. जाणकार असे म्हणतात की, कुणकेश्वरच्या जत्रेतील जाहीर सभेने निवडणुकीच्या निकालाचे पारडे नाथांच्या बाजूने झुकविले.

सन 1957 पासून बॅ. नाथ पै सलग चौदा वर्षे राजापूर मतदार संघाचे अनभिषिक्त सम्राट होते.’ सौंदर्य उपासना म्हणजेच राजकारण’ ही त्यांची राजकारणाची व्याख्या होती. म्हणूनच ते अन्यायाविरुद्ध पेटून उठत. लोकसभेच्या त्यांच्या पहिल्या अधिवेशनात ‘तो आला, तो बोलला आणि जिंकून घेतले सारे’ अशी सभागृहाची स्थिती होती. मतदारसंघातील प्रश्नांबरोबरच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर ते तुटून पडत असत. त्यांच्या समतोल, सडेतोड व अभ्यासपूर्ण भाषणांमुळे त्यांना तत्कालीन प्रधानमंत्री पं. नेहरूंनी ‘असामान्य संसदपटू’ हा किताब बहाल केला.

अमोघ वक्तृत्वाबरोबरच विवेक, प्रखर देशभक्ती आणि समाजवादावर ठाम निष्ठा असणारे नाथ दीनदलित जनतेवर अपार प्रेम करत. ‘कठीण वज्रास भेदू ऐसी’ संसदेतील विरोधी पक्षावर हल्ला करताना असलेली बॅरिस्टर नाथ पै यांची भाषा सामान्य लोकांशी बोलताना ‘मऊ मेणाहूनी मुलायम’ असे. त्यामुळे त्यांनी कोकणी माणसाच्या हृदयात राज्य केले.

संसदेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्यांनी मतदार संघाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. त्यांच्या खासदारकीच्या काळात कोकणात तीनदा वादळे  झाली. संपर्काची त्यावेळी कोणतीही साधने उपलब्ध नसताना मिळेल त्या साधनाने ते कोकणात पोहोचले. सरकारी मदत पोहोचण्यापूर्वी लोकांच्या मदतीने वादळग्रस्त भागात काम केले. वाड्यावस्त्यांवर पोचून नुकसानीची पाहणी करून राज्य शासन व केंद्र शासनाची अधिकाधिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले. 1961 साली झालेल्या वादळात रस्ते मोकळे नसल्यामुळे नाथ पै डोक्यावर सायकल घेऊन मतदारांपर्यंत पोहोचले. सरकारी यंत्रणेवर विसंबून न राहता ग्रामस्थांच्या सहाय्याने रस्ते मोकळे केले. पंतप्रधानांची भेट घेऊन नुकसानग्रस्त भागांना भरपाई मिळवून दिली.

दशावतार ही कोकणची लोककला. सिंधुदुर्ग जिल्ह्याची खास ओळख. मंदिरांच्या परिसरात मध्यरात्रीनंतर लोकरंजनातून सुसंस्कारासाठी ही दशावतारी नाटके साजरी केली जातात. पौराणिक कथांवर उस्फूर्तपणे संवाद सादर केले जातात. पण त्याकाळी या दशावतारी कलाकारांची स्थिती ‘रात्रीचा राजा आणि दिवसा डोक्यावर बोजा’ अशी हलाकीची होती. दशावतार ही कोकणची लोककला असूनही त्याला शासनमान्यता नव्हती याची नाथ पैना खंत वाटत होती. नाटककलेविषयी त्यांना जिव्हाळा होता, कलाकारांविषयी त्यांच्या मनात अआत्यंतिक प्रेम होते. दशावतारी नाटकांना व कलाकारांना शासन मदत व प्रोत्साहन देणार नसेल तर आपण द्यायला हवे, या भूमिकेतून त्यांनी दशावतारी नाटकांच्या स्पर्धा आयोजित केल्या. अजूनही या स्पर्धा घेतल्या जातात.

वेंगुर्ले ते शिरोडा या मार्गावरील मोचेमाडच्या खाडीत होडी उलटून वधू-वरांसह लग्नाचे वराड बुडाले. काही व्यक्तींचा अंत झाला. ही बातमी नाथांना दिल्लीत समजली. त्यांनी तात्काळ वेंगुर्ले गाठून मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केलेच, पण मुंबईला जाऊन बांधकाम सचिवांची भेट घेतली.” आणखी किती लोकांचे बळी गेल्यावर सरकार मोजेवाडच्या खाडीवर पूल बांधणार?” असा खडा सवाल विचारला. पंधरा दिवसात जागेची पाहणी करून फुलाचा आराखडा तयार करण्यात आला. पण जमीन संपादनासाठी अनावश्यक विलंब झाल्यामुळे नाथ यांच्या हयातीत पूल पूर्ण होऊ शकला नाही.

गणेश चतुर्थी हा कोकणवासीयांचा मुख्य सण. वाडीवस्त्यांमधून या काळात भजनांना उधाण येते. भजन हा उपासनेचाच एक मार्ग मानला जातो. कोकणात ठिकठिकाणी भजन डबलबारीच्या स्पर्धा होतात. भजनाला जात असताना कणकवली गडनदीनजीक भजनी मंडळाच्या ट्रकचा अपघात होऊन मृत्युमुखी 20 जण मृत्यूमुखी पडले. नाथांना ही बातमी समजताच त्यांनी दिल्लीहून कणकवली गाठली व अपघातग्रस्तांना मदत केली.

कोयनानगर परिसरात 11 डिसेंबर 1967 ला भूकंपाचा तीव्र धक्का बसला. या भूकंपात मोठ्या प्रमाणात हानी झाली. भूकंपाचा काही भाग देशावर तर काही भाग कोकणात होता. तरीही सरकारी मदत फारशी कोकणच्या दिशेने वळताना दिसली नाही. ही तफावत दूर करण्यासाठी बॅरिस्टर नाथ पै यांनी आवाज उठवला. स्वयंस्फूर्तीने घेतलेले कोकणचे पालकत्व त्यांनी जबाबदारीने निभावले.

कोकण हा निसर्ग संपन्न प्रदेश! पण निसर्गाची श्रीमंती अनुभवणारा कोकणी माणूस मात्र अर्धपोटी! बुद्धिमंतालाही कोकणाबाहेर पडल्याशिवाय धन सन्मान मिळत नव्हता. त्यामुळे घरातील पुरुषमंडळी रोजगारासाठी मुंबईकडे धावत.’ मनीऑर्डर वर जगणारा जिल्हा’ अशी जिल्ह्याची ओळख पुसण्यासाठी बॅरिस्टर नाथ पै यांनी कोकण विकास परिषदेची स्थापना केली.

मुंबईला जोडणारा महामार्ग त्यावेळी नव्हता. त्यामुळे कोल्हापूर मार्गे प्रवास करावा लागे. त्यामुळे बोटीची वाहतूक परवडणारी होती. रहदारीच्यामानाने बंदरे अविकसित होती. बंदराची देखभाल व सुधारणा आवश्यक होती.त्यांनी कोकण किनाऱ्यावर वाहतूक सुरू ठेवण्यासाठी आगबोट कंपन्यांना भाग पाडले. बारमाही बंदरांचा शोध घेऊन बारमाही करण्यासाठी कोकण विकास परिषदेमार्फत काम केले.  बंदरांना जोडणारे रस्ते, मुंबई गोवा महामार्ग, शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी नदीवर पूल व साकव यासाठी त्यांनी प्रयत्न केले. कोकण विकास परिषदेमार्फत त्यांनी समविचारी लोकांना एकत्र करून शासनावर दबाव टाकला.

बॅरिस्टर नाथ पै यांनी कोकणच्या विकासाचा ध्यास घेतला होता.  कोकणची उपेक्षा थांबवण्यासाठी ते सतत झटत असत. कोकणच्या डोक्यावरून जाणाऱ्या कोयनेच्या विजेचा कोकणवासियांना लाभ मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केला. काजू धंद्याच्या विकासाला चालना दिली. कोकणातील शेतीनंतरचा दुसरा प्रमुख व्यवसाय म्हणजे मासेमारी. मासेमारी व इतर छोटे उद्योग संघटित व सहकारी क्षेत्रात सुरू करण्यास प्रोत्साहित केले. पोस्ट व तार ऑफिसे अधिकाधिक असावीत यासाठी ते प्रयत्न करत होते. ते एक सुजाण लोकप्रतिनिधी होते. त्यांनी लोकांच्या गरजांच्या प्राथमिकता निश्चित करून त्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाची योजना केली. आदर्श लोकप्रतिनिधीचा ते एक मापदंडच बनले.

बॅरिस्टर नाथ पै यांना ‘कोकण रेल्वेचा शिल्पकार’ असे म्हटले जाते. लोकसभेत नाथ पै यांनी कोकण रेल्वेचा प्रश्न मांडला. त्यासाठी 1969 साली एक रुपयाची कपात सूचना मांडली. संसदीय लोकशाहीत एक रुपयाच्या कपातीला खूप महत्त्व आहे, पण तांत्रिक कारणाने ती फेटाळली गेली. मात्र पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी नाथ पै यांच्याशी चर्चा करून कोकण रेल्वेच्या सर्वेक्षणाचे आश्वासन दिले. कोकणात रेल्वे धावली की विकासाची गंगाच अवतीर्ण होईल असे नाथांना वाटे. डोंगरद-यातून रेल्वे धावणे हे स्वप्नरंजनच होते. कोकण रेल्वे प्रकल्पाचा पाया घालण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या हयातीत कोकण रेल्वे कोकणात धावू शकली नाही तरी जॉर्ज फर्नांडिस व मधू दंडवते या त्यांच्या सहकाऱ्यांनी समयबद्ध कालावधीत कोकण रेल्वेचे काम पूर्ण केले.

सरकारी पडजमिनीचे शेतकऱ्यांना वाटप करावे यासाठी नाथांनी सत्याग्रहाचे आयोजन केले. माणगाव खोऱ्यातील शेकडो एकर जमीन कसवटधारकांना वाटावी असा ठराव घेतला.

बॅरिस्टर नाथ पै आपल्या भाषणात सांगत ‘देवाने  जर मला पुनर्जन्म दिला तर त्याला मी सांगेन कोकण भूमीतच जन्म दे’. नाथ पैचं कोकणप्रेम असं बावनकशी होतं. एक माजी खासदार एवढी मर्यादित नाथ पै यांची ओळख असूच शकत नाही.  एक राजा माणूस, कोकण रेल्वेचा शिल्पकार, देशातील एक नंबरच्या मतदार संघाचा एक नंबर खासदार अशी त्यांची ओळख आहे.

शूर सैनिकाची अखेर रणांगणात, नटसम्राटाची अखेर रंगमंचावर, तशीच या तेजस्वी वक्त्याची अखेर व्यासपीठावर झाली. बेळगाव येथील भाषणानंतर ते झोपी गेले ते उठलेच नाही. कोकणी जनतेच्या काळजाचा तुकडा विधात्याने हिरावून घेतला. त्यांचे स्मरणही आपल्याला बळ देईल. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ ही प्रार्थना सार्थक करील.    

तव स्मरणाने जागृत होई आज पुन्हा अभिमान

 लोकशाहीच्या नम्रसेवका तुझेच मंगलगान…

© सौ. तेजल गुरुनाथ ताम्हणकर

सदस्य, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण

पत्ता – मु. बागायत, पो. माळगाव, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग. 416606

संपर्क – 9420738375

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डोळ्यांतले पाणी…भाग 9 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ डोळ्यांतले पाणी…भाग – 9 ☆ सौ. अमृता देशपांडे  

सध्याच्या digital युगाच्या झपाट्याने बदलत असलेल्या वेगानं पुढे जाणा-या जगात धावताना माणसाच्या संवेदना बोथट झाल्या आहेत की काय असे वाटू लागले आहे. जे नैसर्गिक होतं ते कृत्रिम झाले आहे. हल्ली रडावंसं वाटतं असताना रडलं तर लोक हसतील किंवा आपण कमकुवत ठरू म्हणून लोक रडण्याचं टाळतात, डोळ्यातलं पाणी परतवून लावतात. तेव्हा ते रडणारं ह्रदय घाबरतं आणि आपलं काम करताना त्याचाही तोल ढळतो. ह्रदयाच्या आजाराचं आणि अकार्यक्षमतेचं हे सुद्धा एक कारण असू शकतं. मन व शरीर यांची एकरूपता म्हणजे तंदुरुस्ती. अशी निरामय तंदुरुस्ती हवी असेल तर संवेदना बोथट होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. शारिरीक व मानसिक सुदृढतेसाठी आचार-विचार, आहार-विहार या सह हसू आणि आसू दोन्ही आवश्यक आहेत.

देवाने सृष्टी निर्माण करताना डोळ्यात पाण्याची देणगी दिली आहे. 

गाई म्हशी, कुत्रे घोडे, याकडे, हत्ती असे पशू रडून आपल्या भावना व्यक्त करतात. त्यांना अश्रू आवरण्याची बुद्धी नाही म्हणून ह्रदयाचे दुखणे नाही. या दैवी देणगी चा प्रसंगी अडवणूक  करून,  नाकारून आपण अपमान तर करत नाही ना असा विचार मनात येतो.

थोडक्यात काय तर आपल्या भावना आणि मन खुलेपणाने योग्य वेळी योग्य प्रकारे व्यक्त होणे महत्वाचे. सुख-दुःख, हसू-आसू, ऊन- सावली यांचं कुळ एकच. नैसर्गिकता. दुःख न मागता येतंच, सावली आपल्याला हवीच असते. मग आसू का नाकारायचे? ते सकारात्मतेने अंगिकारून व्यक्त करावेत. मन हलकं होतं……..

(क्रमशः… प्रत्येक मंगळवारी)

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार – पुष्प – भाग ३६ – परिव्राजक १४ – मध्यभारत ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार – पुष्प – भाग ३६ – परिव्राजक १४ – मध्यभारत ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

जुनागडहून स्वामीजी पालिताणा, नडियाद, बडोदा इथे फिरले. जुनागडच्या दिवाण साहेबांनी बडोद्याला जाताना ज्यांच्या नावे परिचय पत्र दिलं होतं ते बहादुर मणीभाई यांनी बडोद्याला स्वामीजींची व्यवस्था केली होती. तिथून स्वामीजी लिमडीच्या ठाकूर साहेबांखातर महाबळेश्वरला गेले. ठाकुर साहेबांनी स्वामीजींकडून दीक्षा घेतली होती. तिथे ते एक दीड महिना राहिले. त्या काळात महाबळेश्वर हे एक श्रीमंत व्यापारी आणि धनवंत संस्थानिक यांचं, दिवस आरामात घालवण्याचं एक ठिकाण मानलं जात होतं. इथला मुक्काम आणि ठाकूर यांची भेट आटोपून, ते पुण्याहून ते खांडवा इथं गेले आणि तिथले वकील हरीदास चटर्जी यांच्याकडे उतरले. दोन दिवसातच त्यांना स्वामीजी एक केवळ सामान्य बंगाली साधू नसून, ते असाधारण असं श्रेष्ठ व्यक्तिमत्व आहे हे कळलं. तिथे अनेक बंगाली लोक राहत होते, त्यांचीही स्वामीजींची ओळख झाली. काही वकील, न्यायाधीश, संस्कृतचे अभ्यासक असे लोक भेटल्यानंतर स्वामीजींचे उपनिषदातील वचनांवर भाष्य, संगीतावरील प्रभुत्व, आणि एकूणच त्यांचे प्रभावी व्यक्तिमत्व यामुळे हे लोक भारावून गेले होते.(खांडवा म्हटलं की आठवण झाली ती अशोक कुमार, अनुप कुमार आणि किशोर कुमार गांगुली यांची, हे सिनेसृष्टीतले गाजलेले कलावंत सुद्धा या खांडव्याचेच राहणारे.)

खांडव्याहून स्वामीजींनी इन्दौर, उज्जैन, महेश्वर, ओंकारेश्वर या ठिकाणी भेटी दिल्या. भारतातल्या  बारा ज्योतिर्लिंगापैकी एक शिवाचे स्थान असलेले उज्जैन शहर, महाकवी कालीदासांचे उज्जैन, दानशूर आणि कर्तृत्ववान असलेल्या अहिल्यादेवी होळकर यांचे  इन्दौर आणि महेश्वर, अशी पवित्र आणि प्रसिद्ध ठिकाणं पाह्यला मिळाल्याने स्वामीजींना खूप आनंद झाला. ही ठिकाणं फिरताना स्वामीजींना खेडोपाड्यातली गरीबी दिसली. पण त्या माणसांच्या मनाची सात्विकता आणि स्वभावातला गोडवा पण दिसला. हीच आपली खरी संस्कृती आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. याच्याच बळावर आपल्या देशाचं पुनरुत्थान घडवून आणता येईल असा विश्वास त्यांना वाटला होता. कारण त्यांना भारतातील सामान्य जनतेचं प्रत्यक्ष दर्शन झालं होतं.

या भागात त्यांनी जे पाहिलं आणि त्यांना जाणवलं ते वर्णन आपल्या दिवाण साहेबांच्या प्रवास वार्तापत्रात ते करतात. ते म्हणतात, “एक गोष्ट मला अतिशय खेदकारक वाटली ती म्हणजे, या भागातील सामान्य माणसांना संस्कृत वा अन्य कशाचेही ज्ञान नाही. काही आंधळ्या श्रद्धा आणि रूढी यांचे गाठोडे हाच काय तो सारा यांचा धर्म आहे आणि त्यातील सर्व कल्पना, काय खावे, काय प्यावे, किंवा स्नान कसे करावे एव्हढ्या मर्यादेत सामावल्या आहेत. धर्माच्या नावाखाली काहीही सांगत राहणारे आणि वेदातील खर्‍या तत्वांचा गंध नसलेले स्वार्थी व आप्पलपोटे लोक समाजाच्या अवनतीला जबाबदार आहेत”.

हा प्रवास संपवून स्वामीजी पुन्हा खांडव्याला हरीदास चटर्जी यांच्याकडे आले. हरीदास पण स्वामीजींच्या व्यक्तिमत्वावर भारावून गेले होते. त्यातच शिकागो इथं जागतिक सर्वधर्म परिषद भरणार आहे ही बातमी त्यांना समजली होती. हरीदास बाबू स्वामीजींना म्हणाले, आपण शिकागोला जाऊन हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करावे. हा विषय स्वामीजींच्या समोर याआधी पण मांडला गेला होता. धर्मपरिषद म्हणजे, विचार मांडण्यासाठी योग्य व्यासपीठ. पण स्वामीजी म्हणाले, प्रवास खर्चाची व्यवस्था होईल तर मी जाईन. धर्म परिषदेला जायला तयार असल्याची इच्छा स्वामीजींनी पहिल्यांदाच व्यक्त केली होती.

हरीदास बाबूंचे भाऊ मुंबईत राहत होते. हरीदास बाबूंनी स्वामीजींना परिचय पत्र दिलं आणि सांगितलं की, माझे बंधू तुमची मुंबईत, बॅरिस्टर शेठ रामदास छबिलदास यांची ओळख करून देतील. त्यांची यासाठी काही मदत होऊ शकते. मध्यप्रदेशातली भ्रमंती संपवून स्वामीजी मुंबईला आले. हरीदास बाबूंच्या भावाने ठरल्याप्रमाणे स्वामीजींचा छबिलदास यांच्याशी परिचय करून दिला. छबिलदास यांनी तर स्वामीजींना आपल्या घरीच आस्थेने ठेऊन घेतले. छबिलदास आर्यसमाजी होते. स्वामीजी जवळ जवळ दोन महीने मुंबईत होते. छबिलदासांकडे स्वामीजींना काही संस्कृत ग्रंथ वाचायला मिळाले त्यामुळे ते खुश होते. छबिलदास एकदा स्वामीजींना म्हणाले, “अवतार कल्पना आणि ईश्वराचे साकार रूप यांना वेदांतात काहीही आधार नाही. तुम्ही तो काढून दाखवा मी आर्य समाज सोडून देईन”. आश्चर्य म्हणजे स्वामीजींनी त्यांना ते पटवून दिलं आणि छबिलदास यांनी आर्यसमाज खरंच सोडला. यामुळे त्यांच्या मनात स्वामीजींबद्दल खूप आदर निर्माण झाला हे ओघाने आलेच.

आता स्वामीजी मुंबईहून पुण्याला जायला निघणार होते. छबिलदास त्यांना सोडायला स्टेशनवर आले होते. रेल्वेच्या ज्या डब्यात स्वामीजी चढले त्याच डब्यात योगायोगाने बाळ गंगाधर टिळक चढले होते. ते छबिलदास यांच्या जवळचे परिचयाचे असल्याने त्यांनी स्वामीजींचा परिचय करून दिला आणि यांची व्यवस्था आपल्या घरी करावी असे टिळकांना सांगीतले. बाळ गंगाधर टिळक नुकतेच राजकीय क्षेत्रात सक्रिय झाले होते. तर स्वामीजींना राजकारणाशी काहीही कर्तव्य नव्हते पण, हिंदूधर्माविषयी प्रेम, संस्कृत धर्म ग्रंथांचा अभ्यास, भारतीय संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान, अद्वैतवेदांताचा पुरस्कार या गोष्टी दोघांमध्ये समान होत्या. तसच भगवद्गीते विषयी प्रेम हा एक समान धागा होता. देशप्रेमाचे दोघांचे मार्ग फक्त वेगळे होते. दोघांचा रेल्वेच्या एकाच डब्यातून मुंबई–पुणे प्रवास सुरू झाला.

 © डॉ.नयना कासखेडीकर

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नवरात्रोत्सव : देवीच्या मातृरूपाची उपासना ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा  ?

☆ नवरात्रोत्सव : देवीच्या मातृरूपाची उपासना ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

भाद्रपद सरत येतो, तशी पाऊसही ओसरू लागतो. मग घरोघरी सुरू होते लगबग नवरात्रोत्सवाची. कृषी संस्कृतीतून आलेला हा उत्सव. नवं धान्य शेतात तयार झालेलं असतं. वेगवेगळ्या पालेभाज्या, फळभाज्या, वेल-भाज्या यांनी शिवार डोलत असतं. सगळीकडे आनंदी – आनंद असतो. हा आनंद नवरात्रोत्सवातून प्रगट होतो. नवरात्रातील प्रथा, परंपरा बघितल्या, तर लक्षात येतं, ही देवीच्या मातृरूपाची उपासना आहे. तिच्या सृजनशक्तीचा गौरव आहे.

वर्षातून तीन वेळा आपण देवीचा उत्सव साजरा करतो. चैत्रगौर ही वैभवाची, समृद्धीची देवता आहे. तिचे सालंकृत रूप आपण मखरात बसवतो. तिच्यापुढे आरास केली जाते. गृहिणी क्ल्पकतेने नाना रूपात तिची सजावट करते. गृहिणी तिच्या त्या रूपात स्वत:ला बघते. तृप्त होते. समाधान पावते. यात सहभागी करून घेण्यासाठी नातेवाईक, शेजारणी-पाजारणी, मैत्रिणी-गडणी यांना हळदीकुंकवाला बोलावलं जातं.

भाद्रपदात येणार्याल गौरीकडे कन्यारूपात बघितलं जातं. माहेरवाशीणीसारखं तिचं कौतुक केलं जातं. तिला नटवलं, सजवलं जातं. भाजी-भाकरी, पुराणा-वरणाचं जेवण होतं. रात्री झिम्मा-फुगड्या, फेर-गाणी यांची धमाल उडते. तीन दिवसांचं माहेरपण उपभोगून गौर परत जाते.

नवरात्रात ती मातृरूपत घरोघरी अवतरते. आईच्या स्वागतासाठी घरोघरी धांदल उडते. घराचा काना-कोपरा झाडून-पुसून लख्ख केला जातो. हांतरूण-पांघरूण, जास्तीचे कपडे-लत्ते, गोधड्या-चिरगुटे धुवून स्वच्छ केली जातात. आईने म्हणायला हवे ना, लेक गुणवती आहे. घरोघरी थाळीत पत्रावळ घेऊन त्यावर माती पसरतात. त्यात गहू, ज्वारी, बाजारी, मूग, मटकी, चवळी अशी नऊ प्रकारची बी-बियाणे रुजत घालतात. या मातीच्या मधोमध असतो, मातीचा सच्छिद्र घट. त्यावर विड्याची पाने आणि त्यावर नारळ. त्यावर फुलांची माळ सोडली जाते. शेजारी अखंड तेवणारी समई किंवा निरंजन ठेवले जाते.  मातीचा घट हे पावसाची देवता, वरूणदेव याचे प्रतीक आहे तर तेवणारा दीप हे सूर्याचे. धान्य रुजण्यासाठी माती, पाणी, आणि सूर्यप्रकाशाची गरज असते. घरात असं प्रतिकात्मक शेत तयार केलं जातं. त्यातलं बियाणं हळू हळू रुजू-वाढू लागतं. अंकूर येतात आणि आई धनलक्ष्मी त्यातून प्रगट होते. नवमीपर्यंत हे अंकूर चांगले बोट-दोन बोट उंच होतात. नंतर शेजारच्या पाच मुलांना बोलावून त्याची कापणी केली जाते. ते अंकूर कानात, टोपीत खोवायचे, देवाला अर्पण करायचे, शेजारी पाजारी द्यायचे ( जशी काही आपण नव्या धान्याचा वानोळा शेजारी-पाजारी देत आहोत. ), अशी पद्धत आहे.

नवरात्राला ‘देव बसले’ असंही म्हणण्याची पद्धत आहे. या उत्सवाला आणखीही एक प्रथा जोडली आहे. त्याची मुळे पुराणकथेत आहेत. महिषासूर या उन्मत्त दैत्याने देव-मानवांना हैराण करून सोडले होते. जगणे मुश्कील केले होते. देवीने नवरात्राचे नऊ दिवस त्याच्याशी युद्ध करून, त्याचा दसर्यातच्या दिवशी वध केला. या काळात देव तपश्चर्येला बसले आणि त्यांनी त्याचे पुण्य देवीच्या पाठीशी उभे केले. देव तपश्चर्येला बसले, तेव्हा त्यांना हलवून त्यांच्या तपश्चर्येत व्यत्यय आणायचा नाही, म्हणून या काळात एरवी देवांची पूजा केली जाते, तशी पूजा केली जात नाही. आदल्या दिवशी पूजा करून एका डब्यात देव घातले जातात. याला म्हणायचं ‘देव बसले’  म्हणजे देव तपश्चर्येला बसले. दसर्या च्या दिवशी या बसलेल्या देवांना उठवतात व नेहमीप्रमाणे पूजा-अर्चा करून त्यांची देव्हार्यासत प्रतिष्ठापना केली जाते.

आई जन्म देते. पालन-पोषण करते. रक्षणही करते. तिचं जन्मदेचं रूप घरात शेत तयार करून साकार केलं जातं. देवीच्या नैवेद्याच्या रूपाने घरात वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. यातून भरण – पोषण अधीकच रूचीसंपन्न होतं.  पण पोषण केवळ शरीराचं होऊन भागणार नाही. ते मनाचंही व्हायला हवं. नवरात्रीच्या निमित्ताने, भजन, कीर्तन, प्रवचन, भाषणे होतात. गीत-नृत्य, नकला, नाटुकल्या इ. संस्कृतिक कार्यक्रम होतात. या सार्यारतून मनाचे पोषण होते. व्यक्तिमत्वाचा विकास होतो.

आई रक्षणकर्तीही असते. शत्रू नेहमी बाहेरचेच असतात, असं नाही. आपले स्वभावदोष हेही आपले शत्रूच. खोटे बोलणे, अहंकार, द्वेष, मत्सर, असे किती तरी स्वभावदोष आपलं व्यक्तिमत्व काजळून टाकतात. आपल्या मुलात हे दोष वाढू  नयेत, म्हणून आई प्रयत्नशील असते. मुलांना प्रसंगी रागावूनसुद्धा त्यांच्यातील असले दोष दूर करण्याचा ती प्रयत्न करते. नवरात्रातील, भजन, कीर्तन, प्रवचन, व्याख्याने इ. मधून याची शिकवण दिली जाते. सुसंस्कार केले जातात.

आशा तर्हे ने जन्मदात्री, पालनकर्ती, रक्षणकर्ती या तीनही दृष्टीने नवरात्रातील देवीची उपासना ही तिच्या मातृरूपाची उपासना असते. नवरात्रात अनेक घरातून पिठा-मिठाचा जोगवा मागायची चाल आहे. एकनाथांनी या प्रथेवर एक अतिशय सुंदर ‘जोगवा’ लिहिला आहे. नि:संग होऊन वारीला निघालेली ही देवीची उपासक वरील स्वभाव दोष त्यजून वारीला कशी जाते, हे बघण्यासारखे आहे. ते लिहितात,

‘अनादि निर्गुण प्रगटली भवानी । मोहमहिषासूर मर्दनालागुनी ।

त्रिविध तापाची कारवाया झाडणी । भक्तालागी तू पावसी निर्वाणी ।

आईचा जोगवा जोगवा मागेन । आईचा जोगवा जोगवा मागेन ।

द्वैत सारुनी माळ मी घालीन । हाती बोधाचा झेंडा मी घेईन ।

भेदरहित वारिसी जाईन ॥ आईचा जोगवा जोगवा मागेन ।

नवविध भक्तीचं भक्तीचं नवरात्र । धरोनी सद्भाव अंतरीचा मित्र।

ओटी भरोनी मागेन ज्ञानपुत्र। दंभ सासरा सांडेन कुपात्र ।

आता मी साजणी झाले गे नि:संग। विकल्प नवर्या्चा सोडीयेला संग ।

केला मोकळा मारग सुरंग।  आईचा जोगवा जोगवा मागेन ।

नि:संग होऊन वारीला निघालेली ही देवीची उपासिका दंभ, सासरा, विकल्प नवरा असे  सर्व  स्वभाव दोष त्यजून, पोटी ज्ञानपुत्र मागते. भेदरहित होऊन वारीला जाते. त्या उपासिकेइतके नाही, तरी काही प्रमाणात आपल्याला आपल्या स्वभाव दोषांवर नियंत्रण मिळवता आलं तर? तर आपण खर्यान अर्थाने नवरात्रोत्सव साजरा केला, असे म्हणता येईल, होय ना?

© श्रीमती उज्ज्वला केळकर

मो. 9403310170 email-id – [email protected]  

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सर्वपित्री अमावस्या… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

?  विविधा  ?

☆ सर्वपित्री अमावस्या… ऋतू बरवा ☆ सौ राधिका भांडारकर  ☆

आपले सर्व ऊत्सव हे ऋतु चक्रावर अवलंबून असतात.

तसेच आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. साधारणपणे भाद्रपद महिन्यांत शेतीची कामे संपलेली असतात. पीकं तयार होत असतात. गणेशोत्सव संपला की पितृपक्ष सुरु होतो. भाद्रपद, कृष्णपक्षातील पंधरवडा हा पितृपक्ष मानला जातो.

कृतज्ञता पक्ष असेही म्हणायला हरकत नाही.

पूर्वजांचे स्मरण, त्यांच्याविषयीची प्रेमभावना, आदर कृतज्ञता श्रद्धेने व्यक्त करण्यासाठी हा पंधरवडा.

ज्या तिथीला त्यांना देवाज्ञा झाली त्या तिथीस श्रद्धायुक्त मनाने सर्व कुटुंबीय श्रद्धांजली वाहतात.

पूर्वजांना पितर असे संबोधले जाते. त्या दिवशी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून, केळीच्या पानात वाढले जातात व ते पान कावळ्याला खाऊ घालतात. दूध वडे खीर पुरण हे पदार्थ मुख्यत्वे बनवले जातात.

अशी समजूत आहे की, या दिवसात पितर भूलोकी येतात.

ऊत्तर आकाशात देवांचा वास असतो तर दक्षिण आकाशात पितर वास करतात. सूर्य दक्षिणायनात जात असतो.या खगोलशास्त्रीय स्थित्यंतराला दिलेला हा धार्मिक आणि श्रद्घेचा  दृष्टीकोन. परंतु आपल्या पूर्वजांची आठवण ,आज त्यांच्यामुळे आपण जन्मलो, त्यांनी आपल्याला वाढवलं,शिक्षण संस्कार दिले. जगण्याची वाट दाखवली.. त्यांच्या ऋणाची जाणीव ठेवण्यासाठीच हा पितरोत्सव!!

शिवाय या निमीत्ताने पक्षी प्राणी गोरगरिबाच्या मुखी घास घातला जातो. कुणी पूर्वजांच्या नावे धर्मादाय संस्थांना दान देतात ..देणग्या देतात.. या रीतीमागे अतिशय चांगला हेतु आहे. मृतात्म्यांची शांती तृप्ती व्हावी ही भावना आहे. आणि त्यांचा आशिर्वाद सदैव असावा अशी भावना आहे.

आज अनेक वर्षे, पिढ्यानु पिढ्या परंपरेने हा पितृपक्ष मानला जातो. काळाप्रमाणे काही बदल होत असतात.

पण इतकंच वाटतं की पूर्वजांचं ऋण न फिटणारं आहे, पंधरा दिवसांचा हा पितृपक्ष. अत्यंत श्रद्धेने तो साजरा झाला. आज अमावस्या. शेवटचा दिवस. आजच्या या दिवसाला सर्वपित्री अमावस्या म्हणतात. ज्यांना पूर्वजांची तिथी माहित नसते, किंवा वंशातल्या सर्व पूर्वजांना, इतकंच नव्हे तर ज्यांनीआपल्या आयुष्याला दिशा दिली, संस्कार केले, घडवले, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा, आजचा महत्वाचा दिवस !! मात्र एक सल मनात आहे.

आजच्या संवाद नाते संंबध हरवत चाललेल्या काळात जन्मदात्यांची अवहेलना त्यांच्या जीवंतपणी होऊ नये..

नाहीतर मरणानंतर केलेल्या अशा सोहळ्यांना काय अर्थ आहे……?

धन्यवाद!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सेल्फी फोटो… ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆

? विविधा ? 

☆ सेल्फी फोटो… ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆ 

तीसेक वर्षांपूर्वी नुकतेच मोबाईल फोन आले होते. पण आजच्या सारखे ज्याच्या त्याच्या हातात, खिशात मोबाईल नव्हते. ती काही लोकांचीच मक्तेदारी होती. इतरांना तो परवडायचाही नाही. मग त्यावर फोटो काढण्याची सोय झाली. निरनिराळ्या अॅप्स मधून, फीचर्समधून खूप झटपट सुधारणा झाल्या. आणि नंतर सेल्फीचा जमाना आला. पंधरा वर्षांपूर्वी पासून सेल्फी काढणे हे प्रेस्टिजचे लक्षण मानले जाऊ लागले. नंतरच्या काळात तर सेल्फींचा सुळसुळाट झाला.

विज्ञान तंत्रज्ञानांची प्रगती मानवाला सुखकारक ठरली. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून इतर कुठल्याही ठिकाणी संपर्क करणे सोपे झाले. तसेच फोटो पाठवणेही सोपे झाले. परदेशात असलेल्या जिवलगांचा दिनक्रमही त्यातून समजणे, प्रत्यक्ष पाहणे ही नित्याची गोष्ट झाली. याचे मुख्य कारण म्हणजे सेल्फी हेच होय.

सेल्फी स्टिक जवळ बाळगणे हेही कित्येकांना आवश्यक वाटू लागले. सहलीच्या वेळी आपल्याला हव्या त्या कोनातून फोटो सहज काढता येऊ लागले.  एवढ्या सगळ्या तंत्रज्ञान प्रगतीमध्ये ज्याने सेल्फीचा शोध लावला , त्याला खरोखरच सलाम !  बऱ्याच अंशी माणसाला त्याचा फायदाच जास्त होऊ लागला आहे. मलाही होतो. मी माझ्या परदेशात राहणाऱ्या मुलांना इतर कुटुंबीयांना सेल्फी द्वारा भेटू शकत नसले तरी भेटीचा आनंद आम्ही नक्कीच घेऊ शकतो.

पण जेव्हा एखाद्या गोष्टीचा अतिरेक होतो तेव्हा मात्र हे सेल्फी प्रकरण प्रसंगी जिवावर बेतू शकते. विशेषतः खोल पाण्यात, समुद्रात, धबधब्याखाली किंवा उंच डोंगरांवर, कठडे नसलेल्या गच्चीवर सेल्फी काढताना आजूबाजूचे भान बाळगणे अपरिहार्य असते. तसे ते न बाळगले तर सेल्फीच्या अट्टाहासाने अनेक लोक अपघातात बळी पडतात . पाण्यात बुडून, दगडावर आपटून, उंच कड्यावरून पाय घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत.त्यात तरूण मुले मुली ही जीव गमावून बसले आहेत.

जेव्हा प्रगती होते तेव्हा माणूस अशा दुर्घटनांची कधीच अपेक्षा करीत नसतो.किंबहुना विचारही करीत नसतो. पण आपल्याच क्षणैक सुखाच्या आभासी धुंदीत आपला मौल्यवान जीव गमावण्याची वेळ कुणावर येऊ नये. आपले आनंदाचे क्षण आपण आता क्षणोक्षणी सेल्फी घेऊन कायमचे स्मरणात ठेवू शकतो. फुरसतीच्या वेळी त्या क्षणांच्या पुनर्प्रत्ययाचा आनंद घेऊ शकतो. त्यातही ते सेल्फी  इतरांना पाठवले तर त्यांना आनंद होऊन आपला आनंदही द्विगुणित होतो. त्यावर खूप लाईक्स, स्माईली, थंब्ज 👍 आले की आपला इगो सुखावतो 😀.

यामुळे आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते की कॅमेरा घेऊनच फोटो काढणे, ते फोटो स्टुडिओ हे सगळं या सेल्फीमुळे कालबाह्य झाले आहे. फोटोग्राफर लोकांची गरज यामुळे संपली आहे. त्यांना वेगळे व्यवसाय मिळाले असतील. पण आता नव्या युगात कुणीही फोटो, सेल्फी सहज क्लिक करू शकतो.

सेल्फी घेणे, इतरांना पाठवणे, पुन: पुन्हा पाहून आनंद लुटणे, कायम स्मरणात ठेवणे यात काहीच गैर नाही. ही जगरहाटी झाली आहे. मीही काढते सेल्फी . सर्वांना पाठवते.  पण खबरदारी घेऊनच!! ज्यांना पाठवायचा सेल्फी ,त्यांनाही त्यातून आनंदच मिळावा. त्याला आपला सेल्फी पहायचा नसेल तर ते लक्षात आले की नका पाठवू!

काही ठिकाणी जेव्हा अजिबात खबरदारी घेतली जात नाही तेव्हा कधी कधी तिथल्या निसर्गाचे, पर्यावरणाचेही नुकसान होते निसर्ग चुरगळला जातो याकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे. तरूण वर्गामध्ये सेल्फी अधिक लोकप्रिय आहे. असू दे! पण त्याचवेळी इतर कर्तव्ये, जबाबदारी, खबरदारी विसरू नये. एकदा तर सेल्फीच्या नादात जलाशयात एक बोट बुडाली. त्यात बुडून मृत्युमुखी पडलेले लोक डॉक्टर होते. अशी एक बातमी होती. समाजातील या महत्त्वाच्या घटक असलेल्या सुशिक्षितांनी तरी यांचे भान ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक ठिकाणी सेल्फीचा आनंद जरूर घ्यावा ,पण जबाबदारी आणि खबरदारी पाळावी हेच खरे !!!!

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शब्दरंगी रंगताना… ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ शब्दरंगी रंगताना… ☆ श्री अरविंद लिमये ☆

‘शब्दरंगी रंगताना… साध्य आणि साधना’

शब्द हे भाषेचे अलंकार असतात.शब्द सूचक असतात.मार्गदर्शक असतात.ते अर्थपूर्णही असतात आणि कधीकधी फसवेही.शब्दांची अशी असंख्य रुपे असतात. शब्दांच्या या सगळ्या भाऊगर्दीत असा एक शब्द आहे जो त्याच्या वेगळेपणामुळे उठून दिसतो.तो ज्यांना हवं असेल त्यांना नेहमीच भरभरुन देतो आणि देताना गरीब-श्रीमंत, लहान-मोठा, स्त्री-पुरुष, खेडवळ-शहरी असा कोणताही भेदभाव करीत नाही. त्याला आपलंसं करणाऱ्या कोणत्याही व्यक्तिमत्त्वाला तो आदर्शवत बनवू शकतो. या अर्थाने खूप वेगळा आणि म्हणूनच मला मोलाचा वाटणारा  हा शब्द म्हणजे ‘बिनचूक’!

बिनचूक हा शब्द ऐकताच तो फक्त प्रश्न आणि त्यांची उत्तरं यांच्याशी संबंधित आहे असेच वाटते. विद्यार्थीदशेत कोणत्याही प्रश्नाचे उत्तर बिनचूकच लिहिता यायला हवे या दडपणाखाली वाहिलेल्या अभ्यासाच्या ओझ्यामुळे  तो अभ्यास,त्या परीक्षा, प्रश्नपत्रिका,आणि या सर्वांच्या धास्तीमुळे निर्माण झालेली अस्वस्थ घुसमट हे सगळं ‘बिनचूक’ या शब्दाला इतकं घट्ट चिकटून बसलेलं आहे की हा शब्द फक्त प्रश्नोत्तरांशीच संबंधित आहे असंच कुणालाही वाटतं. पण ते तसं नाहीय.’बिनचूक’हा शब्द फक्त चूक आणि बरोबर या टीचभर परिघासाठी आकाराला आलेलाच नाहीय. त्याची नाळ थेट एकाग्रता, नीटनेटकेपणा, निर्णयक्षमता या सगळ्यांशीच अतिशय घट्ट जुळलेली आहे.

बिनचूक म्हणजे जसं असायला हवं तसंच.अचूक. अतिशय काटेकोर.नीट. व्यवस्थित.नि:संदिग्ध ! बिनचूक या शब्दाचे खात्रीचा,विश्वसनीय, भरवंशाचा.. असेही अर्थ आहेत. या सर्व अर्थछटांमधील सूक्ष्मतर धाग्यांची परस्परांमधील घट्ट वीणच एखाद्या व्यक्तीमत्त्वाचा गुणविशेष ठरणारा बिनचूक हा शब्द आकाराला आणते. यातील ‘खात्रीचा’,’विश्वसनीय’, ‘भरवंशाचा’ ही सगळी वैशिष्ट्ये त्या व्यक्तीची अचूक निर्णय घेण्याची क्षमता,कार्यपद्धतीतील पारदर्शकता,त्याची सर्वसमावेशक वृत्ती यामुळे सभोवतालच्या लोकांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रतिमांची प्रतिबिंबेच म्हणता येतील. याउलट सतत चूका करणारी एखादी धांदरट व्यक्ती कुणालाच खात्रीची, भरवंशाची वाटत नाही. ती बेभरवंशाचीच वाटते. एखादे महत्त्वाचे अवघड काम एखाद्यावर तातडीने सोपवायची वेळ आली तर अशी धांदरट व्यक्ती ते काम बिनचूक पूर्ण करू शकेल याबद्दल कोणालाही विश्वास वाटणे शक्यच नसते. त्यामुळेच ती व्यक्ती जबाबदारीच्या, महत्त्वपूर्ण कामांसाठी अविश्वसनीयच ठरते.

अशा धांदरट व्यक्तींकडून होणाऱ्या चूका आणि कामचुकार माणसाने केलेल्या चूका यात अवगुणात्मक फरक नक्कीच आहे. धांदरट व्यक्ती आत्मविश्वासाच्या अभावी बिनचूकपणा पूर्णतः अंगी बाणवू शकणारही नाही कदाचित,पण आपल्यामुळे होणाऱ्या त्रासाची त्याला जाणीव असते. त्यामुळे स्वतःमधे सुधारणा घडवून आणण्यासाठी अशी व्यक्ती त्याच्यापरीने प्रयत्नशीलही असते. आळशी आणि कामचुकार व्यक्तींचं तसं नसतं. त्या वेड पांघरून पेडगावला निघालेले प्रवासीच असतात. कामं टाळायच्या वृत्तीमुळे आपल्या अंगाला तोशीस लावून घ्यायची त्यांची मुळात तयारीच नसते. येनकेन प्रकारेन त्यांचा कामे टाळण्याकडेच कल असतो.

अशा कामचुकार व्यक्तींना बिनचूकपणा अंगी बाणवणे हे अशक्यप्रायच वाटत असते. त्यामुळे ‘मी आहे हा असा आहे’ असं म्हणत स्वतःच लटकं समर्थन करीत रहाण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे एकतर ते खऱ्या अर्थाने समाधानी नसतात आणि ते आयुष्याच्या परीक्षेतसुध्दा काठावरही पास होऊ शकत नाहीत.

याउलट बिनचूकपणा अंगी बाणवणे हे ज्यांच्यासाठी  जाणीवपूर्वक ठरवलेले ‘साध्य’ असते ते आवश्यक कष्ट, स्वयंशिस्त आणि सातत्यपूर्ण प्रयत्न याद्वारे प्रत्येक काम अचूक, दोषरहित व्हावे यासाठी प्रयत्नशील असतात.त्यांच्यासाठी ही एक साधनाच असते.अर्थात ही साधना ते स्वखुशीने मनापासूनच करीत असल्याने त्यांच्यासाठी ती कधीच कष्टप्रद, त्रासदायक नसते तर हळूहळू अतिशय नैसर्गिकपणे ती त्यांच्या अंगवळणी पडत जाते. अशी माणसे कधीच चूका करीत नसतात असं नाही. त्यांच्या हातूनही अनवधानाने क्वचित कधी चूका होतातही. पण ते अशा चुकांमधून काही ना काही शिकत जातात. एकदा झालेल्या चुकीची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सजग रहातात. स्वतःची चूक मान्य करण्यात कधीही कमीपणा मानत नाहीत. आपली चूक मनापासून स्वीकारतात आणि नेमकं काय आणि कसं चुकलंय हे समजूनही घेतात.’बिनचूकपणा’ हे साध्य प्राप्त करण्यासाठीची ही त्यांची साधनाच असते !

हे सगळे कष्ट घ्यायची तयारी नसलेलेच कामचुकारपणा करायला प्रवृत्त होत असतात. त्याना परिपूर्णतेची आस कधी नसतेच.अशा लोकांसाठी बिनचूकपणा हा कोल्ह्याला आंबट वाटणाऱ्या द्राक्षांसारखाच असतो.अन्यथा बिनचूकपणा किंवा नीटनेटकं काम त्यांना अशक्यप्राय वाटलंच नसतं. याउलट परिपूर्णतेचा ध्यास घेतलेली माणसं साधी साधी कामेही मन लावून करतात. त्यातच त्यांचा आनंद आणि समाधान लपलेलं असतं. अनवधानाने झालेली चूकही त्यांना अस्वस्थ करीत असते आणि मग त्या चूकांमधून ते स्वतःत सुधारणा घडवून आणायला प्रवृत्त होतात. स्वतःच्या शिस्तप्रियतेमुळे अंगी बाणलेला हा बिनचूकपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वविकासासाठी प्रमुख घटक ठरत असतो.

परिपूर्णतेचा,अचूकतेचा असा ध्यास घेणाऱ्या व्यक्तींचेही दोन प्रकार असतात. जी माणसे कामात अगदी शिस्तशीर,बिनचूक असतात त्यातील कांहीना  त्याबद्दल वाटणाऱ्या अभिमानाचे रुपांतर कधीकधी अहंकारात होत जाते. त्यामुळे  त्यांच्या वागण्याला एक काटेरी धार येऊ लागते जी इतरांना जातायेता सहज ओरखडे काढत जाते. त्यामुळे इतरांना त्यांच्या कामाबद्दल किंवा परफेक्शनबद्दल एरवी कितीही आदर वाटला तरी ते त्यांच्याजवळ जायला घाबरतात. त्यांच्यापासून थोडं अंतर राखूनच वागतात. हा दोष अर्थातच त्या व्यक्तींच्या अहंकाराचा.त्यांच्या बिनचूकपणाचा नव्हे. अशा अहंकारी व्यक्ती इतरांपेक्षा आपण कोणीतरी वेगळे,श्रेष्ठ आहोत या कल्पनेत सतत तरंगत असतात. आणि स्वतःचा जगण्यातला आनंद मात्र हरवून बसतात.

या उलट यातल्या दुसऱ्या प्रकारच्या व्यक्तींना त्यांच्या बिनचूकपणाचा कधीच दुराभिमान नसतो. सर्वांना सामावून घेण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे ते सगळ्यांना सोबत घेतात,त्यांना नेहमीच आपुलकीने समजावून सांगत स्वतःच्या कृतीने त्यांना कार्यप्रवृत्त करतात.जगणं असं कृतार्थ होण्यासाठी बिनचूक पणाचा अट्टाहास नव्हे तर असोशी आवश्यक असते!

विद्यार्थीदशेतील प्रत्येकाचीच वाटचाल ‘चूक की बरोबर?’ या प्रश्नाशीच बांधलेली असते. तिथे परीक्षेत येऊ शकणारे ‘अपेक्षित प्रश्न’ जसे सहज उपलब्ध होऊ शकतात, तशीच त्या प्रश्नांची बिनचूक उत्तरे इन्स्टंट पुरवणारी गाईडसही. आयुष्यातल्या जगण्याच्या वाटचालीत मात्र निर्माण होणारे असंख्य प्रश्न बऱ्याचदा अनपेक्षित असतात. त्या प्रश्नांचे नेमके आकलन आणि आपण शोधलेल्या त्या प्रश्नांच्या उत्तरांचा होऊ शकणारा दीर्घकालीन परिणाम याचा सारासार विचार करूनच त्या प्रश्नांची उत्तरे ठरवावी लागतात. अर्थातच ही उत्तरे निर्णयप्रक्रियेतूनच तयार होत असल्याने त्या उत्तरांची बिनचूकता हे ज्याच्या त्याच्या निर्णयक्षमतेच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. म्हणजेच बिनचूक निर्णय घेणे हेही कामातील बिनचूकपणा आणि प्रश्नांची बिनचूक उत्तरे देण्याइतकेच महत्त्वाचे असते. अचूक निर्णय घेण्याची निर्णयक्षमतासुध्दा ‘बिनचूक’ या शब्दाने अशी गृहित धरलेली आहे. निर्णयक्षमता वृद्धिंगत होण्यासाठी स्वयंशिस्त, परिस्थितीचे अचूक आकलन आणि प्रत्येक प्रश्नाकडे पहाण्याचा ति-हाईत दृष्टीकोन हे घटक महत्त्वाचे ठरतात.

प्रत्येकाच्या आयुष्यात पदोपदी या ना त्या कारणाने निर्णय घ्यायची वेळ येतच असते. अशा प्रत्येकवेळी दुसऱ्यावर अवलंबून न रहाता ते निर्णय ज्याचे त्यालाच घ्यावे लागतात. तत्काळ निर्णय घ्यायची अशी कसोटी पहाणारी वेळ अचानक पुढे येऊन ठेपण्याची शक्यता अपवादात्मक नसतेच. अशावेळी कोणताही निर्णय घेताना मनात चलबिचल असेल तर ती निर्णय प्रक्रियेसाठी घातक ठरु शकते. काहीवेळा सखोल विचार न करता आतयायीपणाने निर्णय घेतले जातात. असे निर्णय चुकीचे तर ठरतातच शिवाय ते नवे प्रश्न निर्माण करायला निमित्तही ठरत असतात.त्यासाठीच अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीचे नेमके आकलन आणि सारासार विचार हे घटक महत्त्वाचे ठरतात. कोणतीही परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य प्रयत्नपूर्वक सरावाने प्राप्त करणे मग फारसे अशक्य रहात नाही.

आपल्या आयुष्यात निर्माण होणारं दु:ख असो किंवा असमाधान हा बऱ्याचदा आपण स्वतःच त्या त्या वेळी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचाच परिपाक असतो.त्यामुळे अचूक निर्णयक्षमतेचं महत्त्व वेगळं सांगण्याची गरज नाही.

सारांश हाच की बिनचूकपणा अंगी बाणवणे हे मनापासून स्विकारलेले साध्य आणि त्यासाठी कष्ट, स्वयंशिस्त आणि सातत्यपूर्ण प्रयत्न ही साधना जगणं आनंदी आणि कृतार्थ होण्यासाठी अपरिहार्यच ठरते !!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मी आणि काॅफी… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

? विविधा ?

☆ मी आणि काॅफी… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

कॉफी ही माझ्या आयुष्याशी चहाइतकीच जोडली गेलेली आहे. एखाद्या पावसाळी संध्याकाळी खिडकीत बसून गरम कॉफीचे घोट घेताना त्या निसर्ग सौंदर्याची, मोहक वातावरणाची मनावर होणारी जादू किंवा जेव्हा पहिल्यांदा डेटला जातात त्यावेळी त्या प्रेमळ क्षणांची साथ द्यायला सोबत असते ती कॉफी किंवा मग रात्रीच्या निरव शांततेत मंद गाण्याच्या सोबतीने वाफाळत्या कॉफीचा आस्वाद घेताना मिळणारी कमालीची स्वस्थता किंवा पुस्तक वाचताना कॉफीची सोबत असली तर वाचनाचा आनंद द्विगुणीत होतो.. एखाद्या सुंदर दिवसाची सुरुवात व्हावी ती गरमा-गरम कॉफी आणि चविष्ट केक स्लाईससोबत तर क्या बात है…!

कॉफी म्हणजे  विचार, निवांतपणा, संगीत, दरवळणारा सुगंध, मनाची तरतरी, हसू, गप्पा, वाचन, पाऊस, तो आणि ती, आनंद, मैत्र व मी आणि लिखाण…

कॉफीचे माझ्या आयुष्यात निश्चितच एक स्थान आहे. फिल्टर कॉफी असो की कॅफे मोका, कोल्ड काॅफी असो वा कॅपिचुना काॅफी इ. या साऱ्याच प्रकारांनी माझ्या मनात जागा केली आहे..

माझी दिवसाची सुरुवात कॉफीने होते…कॉफी नुसतं असं म्हटलं तरी माझ्या आजूबाजूला कॉफीचा सुगंध दरवळायला लागतो.. काॅफीचा मग ओठांना लावण्याआधीच तिचा मस्त सुगंध काहीतरी आत हलकेच जागं करतं असतो अगदी तसचं जसा पावसाच्या सरींनी दरवळणारा मातीचा गंध… येणा-या आठवणींच्या वर्षावाची जाणीव करून देत असतो.

आठवणींच्या सुगंधात मन चिंब चिंब भिजत असते… काय सांगायचे असते त्याला ? एक वेगळीच आभा का दाटते मनात ?

कारण काॅफीच नातचं असतं हळव्या  जगाशी बांधलेलं रूजू पाहणारं नवं नातं…हे नवं नात स्वीकारताना येणा-या आनंदाच्या सरी झेलू पाहणारं…  खरचं काॅफीचा तो मस्त सुगंध जेव्हा अलगद जवळ येतो तेव्हा नव्या जाणीवांचा बांध अलगद बांधला जातो…

माझ्यासाठी अतिप्रिय काही असेल तर ते म्हणजे गरम स्ट्राँग कॉफी. कॉफी म्हटलं की आठवते तिची जिभेवर रेंगाळणारी थोडी स्ट्राँग कडवट चव.. हो कडवट कारण कॉफी प्यायची तर स्ट्राँगच…कडवट

गोड आणि कॉफी… झोप उडवून तरतरी आणणाऱ्या पेयामध्ये कडक कॉफीचा नंबर पहिला असेल असे माझे मत .. कॉफीला पर्यायी एकतर काही नसावं आणि असलंच तरी कॉफीची सर त्याला नसावी… सुस्ती-आळस-कंटाळा दूर सारून स्फूर्ती आणि ताजंतवानं करण्यात कॉफी फायदेशीर असल्याचं मी तरी अनुभवलं आहे आणि अनुभवत आहे

कामाचा लोड कितीही असू द्या किंवा शीण आला असेल आणि त्याच वेळी समोर कॉफीचा वाफाळलेला कप जेव्हा समोर दिसतो त्या कॉफीचा घोट जेव्हा घशाखाली उतरतो ना तेव्हा हा सगळा शीण, कंटाळा व आळस क्षणार्धात कुठच्या कुठे पळून जातो..

कॉफीचं महत्त्व माझ्या लेखी खूप आहे कारण वेळोवेळी सुख-दुःखात, महत्त्वाच्या क्षणी माझा आत्मविश्वास वाढवण्यात आणि मला खंबीर करण्यात जर कोणाची साथ असेल तर ती माझी सखी कॉफीची..!

लेखन हा माझा आवडता छंद त्यामुळं काही सुचत नसेल आणि कॉफी प्यायली तर माझं डोकं जाम भारी काम करतं थोडक्यात काय तर  माझ्या रिफ्रेशमेंटसाठी कॉफी तिचं काम चोख पार पाडते..

माझ्यासाठी कॉफी म्हणजे बिस्मिल्ला खाँसाहेबांच्या सनईसारखी आहे… रोज हवी असे नाही पण जशी विशेष प्रसंगी ती असल्याशिवाय पूर्णता नाही तसेच काहीसे कॉफीचे आहे.. निवांत आहे, सुंदर माहोल आहे, निसर्ग त्याच्या सौंदर्याची उधळण करत आहे अशा प्रसंगी कॉफी हवीच.. ! त्याशिवाय त्या प्रसंगाला, त्या क्षणाला पूर्तता नाही…

मी एकटीनं एन्जॉय करायची जागा म्हणजे बुक कॅफे..  पुस्तकांच्या दुकानात असलेलं कॉफी शॉप किंवा कॉफी शॉपमध्ये असणारी लायब्ररी असं बुक कॅफेचं स्वरूप.. निवांतपणे, पुस्तक आणि कॉफीच्या सान्निध्यात वीकएंड साजरा करायला हे हक्काचं ठिकाण मनाला आनंद देऊन जाणारं असं मनापासून नमूद करीन.. शांत तरीही छान पॉझिटिव्ह वातावरण..,

पुस्तके वाचताना सोबतीला वाफाळत्या कॉफीचा कप आणि काही समविचारी मित्र- मैत्रिणी सोबत मैफल जमवता आली तर ? ही कल्पनाच भन्नाट नाही ..!

काॅफीचा घुटका घेताना फेसबुक न्याहाळणे हा माझा आवडता संध्याकाळचा कार्यक्रम.. माझ्यासाठी ते फार मोठे विरंगुळय़ाचे चार क्षण.. आजही मी तेच करते..

कॉफी हा प्रवास आहे ठिकाण नाही

जी चालण्यात मजा आहे ती पोचण्यात नाही…अशी ही बहुरंगी, बहुरूपी आणि अनेक आठवणींची साक्षीदार असलेली कॉफी मी तरी दैवी पेयच मानते..!

माझ्या आजवरच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर साक्षीदार म्हणून या कॉफीने मला सोबत केलीये..!

लव्ह यू कॉफी!

एक छोटेसे टेबल सोबत मी व काॅफी

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares