मराठी साहित्य – विविधा ☆ वाडगेभर निर्जीव अन्न… वैद्य रूपाली पानसे ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? विविधा ?

☆ वाडगेभर निर्जीव अन्न… वैद्य रूपाली पानसे ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

वाडगेभर निर्जीव अन्न : आजची फॅशन “🍲🍜🍚

“अ बाउल ऑफ डेड फूड” या माझ्या wordpress च्या ब्लॉगबद्दल खूप सकारात्मक प्रतिक्रिया आणि आभार वाचकांनी कळवले. काही वाचकांनी ही पोस्ट अजून विस्तृत करून मराठीमध्ये लिहिली तर  जास्त लोकांपर्यंत पोचून लिखाणाचे ध्येय साध्य होईल, असे वारंवार सुचवले. ही पोस्ट त्या वाचकांना समर्पित !

आज आहारशास्त्रात , पाकविधीशास्त्रात थोडक्यात फूड इंडस्ट्रीमध्ये अफाट, आमूलाग्र technical क्रांती झाली आहे. गमतीने आपण म्हणतो, काही धंदा चालो ना चालो पण वडापावची गाडी आणि खाण्याचे दुकान याला मरण नाही. किती खरे आहे हे.आज सर्वात जास्त नफा फूड इंडस्ट्री, हॉटेल आणि फूड manufacture सेक्टर कमावतंय. उद्याही हेच चित्र असेल किंबहुना अजून विस्तार वाढला असेल.

ज्या वेगात हा ‘रेडी टू ईट’ पदार्थांचा उद्योग फोफावतोय, त्याच वेगात lifestyle disorders औषधी आणि आरोग्यसेवा क्षेत्रातही वाढ होतेय. याचा अर्थ असा तर नाही ना की, फूड इंडस्ट्री औषधी मार्केटसाठी कस्टमर तयार करतेय? दुर्दैवाने काही अंशी ते खरेही आहे. काही घरात ‘रेडी टू ईट’ पदार्थ हे अगदी रोज, खूप प्रमाणात खाल्ले जातात. अगदी लहान मुलांनाही दिले जातात. (हो, कारण जाहिरातीत टार्गेट ऑडियन्स लहान मुले व त्यांच्या आयाच असतात )

‘रेडी टू ईट’ पदार्थांची यादी भली मोठी आहे. आज उदाहरणादाखल आपण घेऊ ….

कॉर्न फ्लेक्स, ओट मिल, चॉकोस, मुसेली इत्यादि :

अति उच्च तापमानात, अति दाबाखाली मूळ धान्यातील पाण्याचा अंश काढून हे पदार्थ तयार होतात. उष्णता, अति दाब यामुळे यातील नैसर्गिक पोषणमूल्ये जवळजवळ नष्ट होतात. राहतो तो निर्जीव पोषणमूल्यरहित चोथा! आता हा चोथा कोण खाणार म्हणून मग त्यात टाका कृत्रिम व्हिटॅमिन, कॅल्शिअम,  लोह इत्यादि, जे शरीरात नीट शोषले जाईल याची काही शाश्वती नाही.

किती गम्मत आहे नाही? आधी त्या धान्याचा जीव घ्या आणि मग त्यात परत जीव आणण्याचा प्रयत्न करा. या सगळ्यात मूळ पदार्थांपेक्षा processing कॉस्ट वाढलेली असते तसेच टिकवणे, चव वाढवणे,  दिसायला आकर्षक असावे या गोष्टीतून त्यात वेगवेगळी रासायनिक preservatives, रंग, मीठ, साखर आणि फ्लेवरची भर पडते. काही ब्रॅण्ड्समध्ये तर वाळवलेल्या भाज्या, फळेही असतात. समस्त पिरॅमिड रिटर्न mummy, मृत शाक, फल, धान्य संमेलनच जणु !

असे पदार्थ वारंवार खाण्यात असणाऱ्या स्त्रियांच्या गटाचा आणि असे पदार्थ न खाणाऱ्या स्त्रियांच्या गटाचा अभ्यास केला असता, हे पदार्थ खाणाऱ्या स्त्रियांमध्ये स्थूलता, अतिउच्चरक्तदाब, तसेच मधुमेहाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले. कमालच आहे! पण जाहिरातीत तर सुडौल कमरेची बाई हे ३ आठवडे खा आणि वजन कमी होईल असे सांगत असते. वरून टाकलेल्या मीठ,  साखरेचे परिमाण दुसरे काय. आयुर्वेदानुसार असे निर्जीव, अति उष्णतेचा संस्कार झालेले, कोरडे अन्न हे वात दोष वाढवून शरीरात अनेक व्याधी उत्पन्न करण्याचे एक मुख्य कारण मानले जाते.

ओट हे तर अतिशय निकृष्ट धान्य वर्गात गणले जावे, इतके याचे पोषणमूल्य कमी आहे. ओटचा ग्लायसिमीक इंडेक्स (म्हणजे हे पचवताना रक्तातील वाढलेली साखरेची पातळी) ही जास्त असते. मी प्रत्यक्षात मात्र खूप मधुमेही रुग्णांना, “डॉक्टर, म्हणजे मी अगदी नियमित ओट मिल घेते, unhealthy असे काहीच खात नाही हो.” असे भक्तिभावाने सांगताना पाहते. बसतोय ना धक्का एक एक वाचून. असो !

ओट meal नियमित घेणाऱ्या व्यक्तींमध्ये कुपोषणाचे सगळी लक्षणे आढळून येतात, ज्यामुळे हाडे, सांधेदुखी, थकवा, पचनाच्या तक्रारी,  मलबद्धता, अहो, इतकीच नाही ही गोष्ट! अगदी आतड्यामध्ये मार्गावरोध होणे (intestinal obstruction, जी सिरिअस स्थिती असते) इतपत आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. याला डेटा,  research, सगळ्याचा आधार  आहे. गुगल करा.

मूळ म्हणजे पोषणरहित अन्न खाऊन शरीराचे हाल करा, वजन आपोआप कमी होईल ही विचारसरणीच किती भयानक आहे. सत्य आहे – आजच्या मनी ओरिएंटेड सोसायटीचे ! दुसरे काय?

‘रोज रोज ताजा नाश्ता बनवणे शक्य नसते हो’, ‘खूप सवय झाली या पदार्थांची, आता मुले ऐकत नाहीत’, ‘असे कसे चालते मार्केटमध्ये, जर एवढे दुष्परिणाम असतील तर?’

 – या सगळ्याला एकच उत्तर आहे, ‘ब्रॅण्डिंग’! 

‘ब्रॅण्डिंग’ची माया जी मला, तुम्हाला,आपल्या मुलांना बरोबर जाळ्यात ओढते. जाहिरात, सुंदर सुंदर मॉडेल आणि भ्रम निर्माण करणारे मोठे मोठे दावे! यात अगदी आयुर्वेदिक, आयुर्वेदिक म्हणून झेंडा फडकवणारे शांतंजली किंवा इतर हर्बल कॉर्न फ्लेक, मुसेलीवाले पण येतात बरं का!

आयुर्वेद वेगळा, स्वदेशी वेगळे, गल्लत नको.

अरे हो हल्ली ‘रेडी टू ईट व मेक’ पोहे, खिचडी, सांजा अशीही पाकीटे  मिळतात बरं का! तेही याच गटातले आहेत, विसरू नका.

अगदी क्वचित कधीतरी, पर्याय नाही, म्हणून हे पदार्थ खाणे समजू शकते.  परंतु अगदी वारंवार, खूप प्रमाणात आणि सगळ्यात महत्वाचे घरातील लहान मुले व वृद्ध व्यक्तीस हे खाण्यास देत असाल तर, नक्की परत विचार करा.

आपल्या आजूबाजू सहज मिळणाऱ्या ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, साळीच्या लाह्या ह्या वरील पदार्थाना उत्तम पर्याय ठरू शकतात. बाकी, ताज्या नाश्त्याच्या पदार्थांबाबत मी मागेच एक पोस्ट सविस्तर लिहिली आहे.

आपण राहतो त्या भौगोलिक परिस्थितीला, शरीराला उपकारक व अनुसरून आपले पारंपरिक पदार्थ असतात. आळीपाळीने असे पारंपरिक व ताजे पदार्थ खाण्यात ठेवणे कधीही उत्तम.

ताजे खा, साधे खा, निरोगी राहा.

लेखिका – वैद्य रुपाली पानसे –

मो 9623448798 ईमेल [email protected]

संग्राहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सद्गुरू कशासाठी हवा? ☆ संकलन – श्री मनोज लिंग्रस ☆

? विविधा ?

☆ सद्गुरू कशासाठी हवा? ☆ संकलन – श्री मनोज लिंग्रस ☆

सद्गुरू कशासाठी हवा ?

महाभारतातलीच एक कथा आहे.

द्रौपदी स्वयंवरात सर्व राजे, युवराज आपापलं कौशल्य पणाला लावून मत्स्यभेद करण्याची पराकाष्ठा करीत होते.

पणही विलक्षणच होता!

उंच छताला एक चक्र फिरत राहणार. त्याच्या एका आरीवर लाकडी मासा बांधलेला. ते चक्र फिरत असतांना नेम साधून त्या माशाच्या डोळ्याचा भेद करायचा.

उ:! एवढंच?

नाही! ते तर कुणीही करेल! इथे तर एकाहून एक निष्णात धनुर्धर उपस्थित होते!

अन् स्वयंवर साक्षात याज्ञसेनीचं! सर्वच प्रतिस्पर्धी इरेस पेटलेले!

पऱंतु खरी मेख पुढेच होती!!

नेम सरळ माशाकडे बघून धरायचा नव्हता. खाली भलंमोठं तसराळं पाणी भरून ठेवलं होतं. वर मासा लावलेलं चक्र फिरत असतांना खाली तसराळ्यात बघून नेम धरायचा होता अन् माशाच्या डोळ्याचा वेध घ्यायचा होता!

इथेच सर्वांचा हिरमोड झाला होता. नीट नेम धरणारे भले भले पाण्याच्या तरंगांमुळे चक्क पराभूत झाले होते. एकेक धुरंधर हताश होऊन परतलेत.

लक्ष्यभेद करायला अर्जुन पुढे सरसावला. एक क्षण त्याने कृष्णाकडे बघितलं.

कृष्णानी खूण करून त्याला निकट बोलावलं.

सूचना केली,

“हे बघ, मन शांत ठेव.

नीट वीरासन घाल. धनुष्यावर बाण चढव, प्रत्यंचा ओढल्यावर हात स्थिर ठेव. पापणी सुध्दा लवू देऊ नकोस! नेमक्या क्षणी तीर सोड – बाकी मी पाहून घेईन.”

अर्जुन हासला.

“काय झालं? कां हसलास?”

“कृष्णा, वीरासन मी घालणार, नेम मी धरणार, तीर पण मीच सोडणार. तुला करायला बाकी उरलं काय रे?”

आता स्वत: कृष्ण हसलेत.

“पार्थ, हे सर्व तुलाच करायचंय. मी फक्त तेवढंच करणारे जे तुला नाही जमणार.”

“हु:! अन् ते काय असणारे?”

“सांगू? जमेल तुला?”

“सांग बघु…”

“त्या तसराळ्यातलं पाणी स्थीर ठेवण्याचं काम माझं”

एक क्षण विचार केल्याबरोब्बर अर्जुन शहारला! सावध झाला!

दुस-याच क्षणी डोळे मिटले. मनोमन कृष्णाला वंदन करून पण जिंकायला आत्मविश्वासाने पुढे सरसावला. पुढे काय झालं सर्वांनाच माहितीये!

हरिकृपेचा महिमाच असा असतो! त्याची सोबत होती म्हणुन पाचांच्या केसालाही धक्का लागला नाही. अन् त्याचीच सोबत नव्हती, तर शंभरातला एकही वाचला नाही…………

संकलन – मनोज लिंग्रस

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! ☆ शालन, मालन आणि मोरू ! (भाग 2) ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? चं म त ग ! 😅

😅 शालन, मालन आणि मोरू ! (भाग 2) 😂 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

तर मंडळी, आपला मोरू पंतांचा बायकोला नवीन साडी घेण्याचा कानमंत्र घेवून, अगदी आनंदाने आपल्या खोलीकडे निघाला. त्या आनंदाच्या भरात समोरून येणाऱ्या दोन तीन चाळकऱ्यांना त्याने धडका पण दिल्या आणि त्या सगळ्यांना सॉरी म्हणत म्हणतच तो आपल्या खोलीकडे मार्गक्रमण करू लागला. कधी एकदा शालनला नवीन साडी घ्यायला जाऊया हे सांगतोय, असं त्याला होऊन गेलं होतं.

तेवढ्यात, आपल्याच विचाराच्या तंद्रित चालत असलेला मोरू आणि समोरून येणाऱ्या लेले काकूंची इतक्या जोरात धडक झाली, की काकूंच्या डोक्यावरची पाण्याची कळशी पूर्ण रिकामी होऊन, मोऱ्याला जेंव्हा नखशिखान्त अंघोळ झाली, तेंव्हा कुठे तो भानावर आला.  “मोऱ्या काय केलंस हे ?” “सॉरी काकू !” असं बोलून तो कपडे झटकत झटकत खोलीकडे जाऊ लागणार तेवढयात लेले काकूंनी त्याच्या बकोटीस धरून, “अरे लक्ष कुठे होतं तुझं? का सकाळी सकाळी श्रावणी सोमवारची भोले नाथाची भांग चढवून आलायस ?” असं रागात विचारलं. “काही तरीच काय काकू ? मी म्हटलं ना तुम्हांला सॉरी” असं म्हणून मोऱ्या परत जायला लागला तेंव्हा लेले काकू त्याला म्हणाल्या, “मोऱ्या गधडया आज श्रवणातला शेवटचा सोमवार.” “बरं मग ?” “अरे मग, काय मग ? आज माझा कडक उपवास असतो आणि मी स्वतः पाच कळशा पाणी डोक्यावर वाहून, आपल्या चाळीतल्या शंकराच्या देवळात त्या भोळ्याला स्नान घालते, गेली कित्येक वर्ष, कळलं ?” “अरे व्वा काकू, छानच करता तुम्ही हे. आता तो भोळा शंकर तुमची ही सेवा मान्य करून तुम्हांला नक्कीच प्रसन्न होऊन, एखादा चांगलासा वर देईल बघा.” असं उपरोधीक स्वरात मोऱ्या लेले काकूंना म्हणाला. पण त्याच्या असल्या बोलण्याकडे काकूंनी काणा डोळा करीत त्याला म्हटलं “अरे तो काय देईल अथवा न देईल यात मला काडीचा इंटरेस्ट नाही.” त्यांच हे बोलणं ऐकून मोऱ्या म्हणाला, “मग बरंच झालं की काकू!  माणसाने असंच निस्वार्थी मनाने आपलं कर्म करीत जावं, फळाची अपेक्षा कधी करू नये.”

काकूंच्या कळशीतल्या थंडगार पाण्यात भिजल्यामुळे मोऱ्याला आता बऱ्यापैकी थंडी वाजू लागली होती. शिवाय शालनला कधी एकदा साडी शॉपिंगची बातमी सांगतोय असं त्याला होऊन गेलं होतं. म्हणून तो धीर करून लेले काकूंना म्हणाला “बरं येतो आता काकू, आधीच उशीर झालाय.” असं म्हणून तो पुन्हा वळणार तोच लेले काकूंनी त्याची वाट परत अडवली !

“आता आणखी काय काकू ? अहो, मी आता हे ओले कपडे बदलले नाहीत ना, तर मला नक्कीच न्यूमोनिया होईल बघा !” “मोऱ्या मला सांग, अंघोळ करतोस तू ?” “म्हणजे काय काकू, रोजच करतो मी अंघोळ.” “मी रोजच विचारत नाहीये, आज केलीस कां अंघोळ ?” असं जरा काकूंनी आवाज चढवून विचारल्यावर मजल्यावरचे शेजारी पाजारी काकूंचा तो सुपरिचित आवाज ऐकून त्या दोघां भोवती लगेच गोळा झाले. चाळकरी गोळा झालेले बघून, नाही म्हटलं तरी मोऱ्या थोडा घाबरला. या चाळकऱ्यांना सक्काळी सक्काळी घरातली कामं नसतात कां ? असा सुद्धा एक प्रश्न त्याच्या मनांत डोकावून गेला. पण तो प्रश्न त्याने लगेच झटकून, आता लेले काकूंच्या तावडीतून आपली लवकरात लवकर सुटका करून घेण्यासाठी, त्याने परत सॉरी म्हणण्यासाठी तोंड उघडले, पण त्याला पुढे बोलू न देता लेले काकू कडाडल्या “मोऱ्या काय विचारत्ये मी ? अरे आज अंघोळ केल्येस कां नाही ?” “नाही काकू, अजून माझी अंघोळ व्हायची आहे. त्याच काय झालं, आपल्या पिकनिक…” त्याला मधेच तोडत लेले काकू म्हणाल्या “मग बरंच झालं !” लेले काकूंच ते बोलणं ऐकून मोऱ्या आश्चर्याने म्हणाला, “काय बरं काय झालं काकू ?”  “अरे तू अजून अंघोळ केली नाहीस ते बरंच झालं असं म्हणत्ये मी !” “कां काकू ?” त्यावर लेले काकू मोऱ्याला समजावणीच्या सुरात म्हणाल्या “मोऱ्या माझ्या डोक्यावरची कळशी तुझ्या डोक्यावर पूर्ण रिकामी झाल्यामुळे आता तुझी अंघोळ झाल्यातच जमा आहे. तेंव्हा आता एक काम कर.” लेले काकूंच्या तोंडातून ‘एक काम कर’ हे शब्द ऐकून मोऱ्याचा चेहरा पडला. त्याने नाईलाजाने काकूंना विचारलं  “कसलं काम काकू ?” “आता या ओल्या कपड्यानिशी मला एक एक करून  नळावरून पाच कळशा पाणी आणून दे, भोळ्या शंकराच्या अभिषेकसाठी. मी तुझी खाली देवळाजवळ वाट बघत्ये, जा पळ लवकर !” असं बोलून मोऱ्याला तोंडातून एक अवाक्षर सुद्धा काढायची संधी न देता, लेले काकूंनी खाली पडलेली आपली कळशी मोऱ्याच्या हातात जबरदस्तीने ठेवली आणि त्या मागे वळून न बघता जिन्याच्या पायऱ्या उतरून तरातरा जाऊ लागल्या.

लेले काकूंच्या या वागण्याचा मोऱ्याला इतका राग आला, पण त्याचा नाईलाज होता. चूक त्याचीच होती. त्याने आजूबाजूला हसणाऱ्या चाळकऱ्यांकडे एकदा रागाने पाहिले आणि तो हातातली कळशी घेवून गपचूप पाणी आणण्यासाठी वळला.

काकूंच्या या पाच कळशा पाणी पाहोचविण्याच्या कामात अडकल्यामुळे आणि नळावर पाणी भरण्यासाठी गर्दी असल्यामुळे, मोऱ्याचे आणखी पुढचे दोन तास खर्ची पडले.  एकदाची मोऱ्याची ती कामगिरी फत्ते झाल्यावर, दमला भागला मोरू आपल्या खोलीकडे वळला आणि खोलीत शिरता शिरता आनंदाने म्हणाला, “अगं ऐकलंस का शालन, आज संध्याकाळी की नाही आपण दोघं….” आणि पुढचे शब्द त्याच्या तोंडातून बाहेरच आले नाहीत मंडळी. तो घरात शिरला आणि त्याच लक्ष चहा पीत खुर्चीवर बसलेल्या एका तरुणीकडे गेलं. शालन तिच्या बाजूला उभी होती आणि त्या दोघींच्या गप्पा अगदी रंगात आल्या होत्या. त्यानं त्या तरुणीला या आधी कधीच पाहिलं नव्हतं, म्हणून त्याने आत येत येत शालनला विचारलं “या कोण शालन ?” “अहो ही माझी शाळेतली मैत्रीण मालन !” असं म्हणून शालन आणि मालन दोघीही हसायला लागल्या. पण शालनच्या तोंडातून ‘मालन’ हे नांव ऐकल्या ऐकल्या मोऱ्याच अवसान पार गळालं.  त्यावर शालन त्याला म्हणते कशी “अहो पंतांनी माझ्या आणि हिच्या नावाची केलेली गफलत परवा बोलता बोलता मी सहज मालनला सांगितली आणि….” शालनला पुढे बोलू न देता मालन मोऱ्याला म्हणाली “अहो भावजी, पंतांच्या या गफलतिचा फायदा घेवून मीच शालनला म्हटलं, आपण जरा भावजींची गंम्मत करू या का ?” “आणि मी सुद्धा या गोष्टीला तयार झाले आणि तुमची जरा…..” आता शालनला थांबवत मोऱ्या म्हणाला, “काय मस्त ऍक्टिंग केलीस गं तू शालन.  मला पिकनिकला जायला आत्ताच्या आत्ता १,५००/- रुपये द्या नाहीतर घटस्फोट द्या. मला अजिबातच संशय आला नाही तुझा, तू ऍक्टिंग करत्येस म्हणून ! बरं पण तुम्ही दोघी मैत्रिणी बसा गप्पा मारत, मी आलोच अंघोळ करून.” असं म्हणून मोऱ्या आत वळला आणि खो खो करून हसतच सुटला.

मंडळी, आता तुम्ही म्हणाल यात मोऱ्याला खो खो हसण्यासारखं काय झालं असेल ? तर त्याच उत्तर असं आहे, की शालन आणि मालनच्या या गंम्मतीच गुपित त्याला आता कळल्यामुळे, तो शालनला घेणार असलेल्या नवीन साडीचे दोन तीन हजार वाचले नाही का ? अहो, तुम्ही पण मोऱ्याच्या जागी असतात तर असेच खूष होऊन हसला असतात नां ? मग !

© प्रमोद वामन वर्तक

२६-०८-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शुभास्ते पंथान: सन्तु ! ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ शुभास्ते पंथान: सन्तु ! ☆ श्री अरविंद लिमये ☆

माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे, विचारशील आहे, हे कितीही खरं असलं तरी प्रत्येक माणूस आपल्या बुद्धीचा आणि विचार शक्तीचा प्रत्येक वेळी योग्य पद्धतीने वापर करत असतोच असे नाही. तो तसा वापर करणे पूर्णतः अपेक्षित असलेली तर्क ही संकल्पना! आपल्या बुद्धीचा आणि विचारशक्तीचा योग्य पद्धतीने कसा उपयोग करायचा याचे विकसित झालेले शास्त्र म्हणजेच ‘तर्कशास्त्र’! इंग्रजीतील ‘लॉजिक’ या शब्दाचे भाषांतर म्हणून तर्कशास्त्र हा शब्द सर्रास वापरला जातो. लॉजिक हा शब्द तसा सुसंगत विचारांच्या सहाय्याने ज्ञाननिर्मिती करु पहाणाऱ्या विविध क्षेत्रांसाठी अतिशय अर्थपूर्ण ठरतो. म्हणूनच फक्त तर्कशास्त्रच नव्हे तर इतर विविध ज्ञाननिर्मिती शाखांच्या नामकरणासाठी सुद्धा लॉजिक हा शब्द प्रत्यय बनून आलेला दिसून येतो. बायॅलॉजी, सोशॉलॉजी, अॅस्ट्रोलॉजी, सायकॉलॉजी अशी अनेक उदाहरणे सांगता येतील.

अर्थात तर्कशास्त्र हा  विचारवंत आणि अभ्यासक यांच्यासाठी एक सखोल अभ्यासाचा विषय असेलही कदाचित पण सर्वसामान्य माणसांसाठी ‘तर्क’ हा फक्त स्वतःकडून नकळत होणाऱ्या एका मानसिक पातळीवरील प्रक्रियेच्या प्रवासापुरताच परिचयाचा असतो.

तर्क म्हणजे अनुमान, कयास, अंदाज असेच बरेच कांही हा सर्वसाधारण समज. तर्क करण्याच्या रूढ पद्धतीचा विचार केला तर ते पूर्णांशाने खरेही आहे. कारण सहसा सर्वसामान्य व्यक्तींकडून अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने तर्क केला जात नाहीच. ‘असे घडले असेल किंवा असे घडेल’ हा ज्याचा त्याचा अंदाजच असतो आणि त्यालाच सर्रास तर्क असे म्हटले आणि म्हणूनच समजले जाते. म्हणूनच तर्क म्हणजे अंदाज असला तरी प्रत्येक अंदाज ‘तर्क’ असतोच असे नाही. तर्काला वास्तवाचा, सत्यघटनांचा, आपल्या अनुभवांचा आणि सुसंगत विचारांचा आधार आवश्यक असतो. सर्वसाधारणपणे अंदाज मात्र व्यक्तिगत भावना, इच्छा, वासना यांनी प्रभावित झालेले असू शकतात. त्यामुळे बुद्धिनिष्ठ, सुसंगत विचारांच्या आधारे केला केलेला अंदाज आणि त्यातून काढलेले अनुमान हाच तर्क. आणि भावनिक प्रभावाखाली केलेले अंदाज मात्र अशास्त्रीय म्हणूनच कुतर्क, वितर्क, तर्कट ठरण्याची शक्यता अधिक.

सुसंगत विचारांच्या सहाय्याने केलेल्या तर्काचे सर्वांच्या परिचयाचे असे बुद्धिबळाच्या खेळाचे उदाहरण देता येईल. या खेळात प्रतिस्पर्ध्या विरुद्ध डावपेच करतानाच त्याच्या चालीवरून त्याच्या अपेक्षित चालींबद्दलचा तर्कशुद्ध विचार करून स्वतःची पुढची खेळी ठरवली जाते. युद्धात किंवा गनिमी काव्यात तर्कशुद्ध विचाराने घेतलेले निर्णयच अतिशय महत्त्वाचे असतात. गुन्हेगारांचा तपास करतानाही त्यातल्या चाली आणि निर्णयही असेच तर्कसंगत असणे आवश्यक ठरते. एरवी चोर सोडून संन्यासी फासावर लटकतो. राजकारण हासुद्धा तर्काधिष्ठित निर्णयातून आकाराला येणारा बुद्धिबळाचा खेळ असला तरी त्या खेळाला बुद्धिबळासारखे काटेकोर नियम मात्र नसतात. तरीही राजकारणाच्या खेळातही शह आणि काटशहांसाठी तर्कशुद्ध अनुमान, अंदाज महत्त्वाचेच ठरतात. या उलट दैनंदिन व्यवहारातले बरेचसे तर्क हे भावनांनी प्रेरित असल्याने व त्यामध्ये सारासार विचार व बुद्धी चातुर्याचा बऱ्याचदा अभाव असल्याने वितर्कच ठरत असतात.

संतुलित मन आणि तर्कशुद्ध विचार हे अचूक तर्कासाठी अतिशय अत्यावश्यक म्हणूनच महत्त्वाचे ठरतात. अचानक समोर येऊ पहाणाऱ्या संकटाच्यावेळी या दोन्ही गोष्टींचा अभाव असण्याची शक्यता असल्याने तर्कशुद्ध निर्णयांअभावी त्या संकटामुळे झालेल्या नुकसानीची तीव्रता खूप वाढल्याचे बऱ्याचदा अनुभवाला येते. त्यामुळेच अशा कसोटीच्या क्षणी तर्कशुद्ध निर्णयच संकटाची तिव्रता कमी करु शकतात.

यासाठी तर्क हा विचारांचा एक प्रवास आहे हे समजून घ्यायला हवे. योग्य निर्णय हा या प्रवासाचा अखेरचा थांबा. तिथवर सुखरूप पोहोचायचे तर बुद्धी आणि संतुलित मन यांच्या सोबतीनेच हा प्रवास व्हायला हवा. तरच तो न भरकटता अचूक दिशेने होईल. आणि त्यातून आकाराला आलेला तर्कच योग्य निर्णयाच्या थांब्यावर आपल्या स्वागताला हजर असेल!

आपणा सर्वांसाठी यापुढील अथक तर्कप्रवासासाठी ही संवादांची शिदोरी आणि ‘शुभास्ते पंथान: सन्तु’ या शुभेच्छा !!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डोळ्यांतले पाणी…भाग 4 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ डोळ्यांतले पाणी…भाग – 4 ☆ सौ. अमृता देशपांडे  

चिंतन लहानपणापासून हुशार मुलगा. पहिला नंबर कधीच सोडला नाही. मित्रांच्यात प्रिय, शिक्षकांच्यातही लाडका . तो सातच वर्षाचा होता,  तेव्हा त्याचे वडील स्वर्गवासी झाले. आईनं नोकरी करून उपजीविका केली. चिंतन आणि त्याच्या बहिणीनं कधीच आईकडे काही मागितलं नाही,  कसलाच हट्ट केला नाही. शाळा,  अभ्यास,  परीक्षा, स्पर्धा,  आणि क्रिकेट,  बस्स, इतकंच! इतकंच त्याचं जग.दहावी ला 94% मार्क मिळाले,  राज्यात सहावा व शाळेत पहिला आला. आईला झालेला आनंद तिच्या डोळ्यांतून घळाघळा वहाणा-या पाण्यातून ओसंडत होता. पती गेल्याचं दुःख, मुलांना वाढवताना एकटीनं केलेला प्रवास , मुलांच्या भविष्याच्या काळजीने जागून काढलेल्या रात्री या विचारांनी मनात काहूर उठवलं होतं. चिंतन चं यश बघून ती कृतार्थ झाली.  अनेक ठिकाणी अभिनंदनाचे सत्कारसोहळे झाले.त्याच्या शाळेत जेव्हा त्याचा सत्कार झाला तेव्हा त्याचं नाव पुकारताच सर्व शिक्षक आणि मुलांनी उभे राहून त्याच्यासाठी वाजवलेल्या टाळ्या आणि मुख्याध्यापकांनी त्याचं तोंडभरून केलेलं कौतुक बघून आईला तिचे अश्रू कसेच आवरता येत नव्हते. आयुष्याच्या एका महत्वाच्या टप्प्यावर तिला कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं.  त्यामुळे ‘ आसवांचा पूर माझ्या पापण्यांना पेलवेना’ अशी तिची अवस्था झाली.

(क्रमशः… प्रत्येक मंगळवारी)

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग ३१ परिव्राजक ९. मूर्तीपूजा ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग ३१ परिव्राजक ९. मूर्तीपूजा ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

अलवरला राजेसाहेबांचे दिवाण मेजर रामचंद्र यांना स्वामीजींबद्दल कळलं होतं. त्यांनीही स्वामीजींना आपल्या घरी बोलावलं. अलवर संस्थानचे राजे महाराज मंगलसिंग होते. त्यांच्यावर पाश्चात्य संस्कृती आणि तिथले रीतिरिवाज यांचा प्रभाव होता. त्यामुळे दिवाण साहेबांना वाटलं की स्वामीजींची भेट घडवून आणली तर राजेसाहेबांचा दृष्टीकोण थोडा तरी बदलेल. म्हणून त्यांनी महाराजांना चिठ्ठी पाठवली की, उत्तम इंग्रजी जाणणारा एक मोठा साधू इथे आला आहे. तसे दुसर्‍याच दिवशी राजे साहेब दिवाणांच्या घरी स्वामीजींना भेटायला आले. त्यांनी स्वामीजींना पहिलाच प्रश्न विचारला की, “आपण एव्हढे विद्वान आहात, मनात आणले तर महिन्याकाठी कितीतरी पैसा सहज मिळवू शकाल. मग आपण असे भिक्षा मागत का फिरता?”स्वामीजींना हा प्रश्न नवीन नव्हता. हाच प्रश्न रामकृष्ण संघाचं काम सुरू केलं तेंव्हा भिक्षा मागायला गेले असताना अपमान करण्यासाठी विचारला गेला होता. पण आज प्रश्न विचारणारी व्यक्ती  श्रेष्ठत्वाचा अहं असणारी, हातात सत्ता असणारी व्यक्ती होती.

महाराजांच्या प्रश्नाचे उत्तर न देता स्वामीजींनी त्यांना उलट प्रश्न विचारला की, “महाराज आपण सदैव पाश्चात्य व्यक्तींच्या सहवासात वावरता. शिकारीला वगैरे जाण्यात वेळ दवडता. प्रजेविषयीच्या आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करता. हे आपण का करता सांगा बरं?” उपस्थित लोक जवळ जवळ भ्यायलेच.  राजेसाहेबांना असा थेट प्रश्न ? पण राजेसाहेब शांत होते. त्यांनी विचार केला आणि म्हणाले, “का ते मला नेमकं सांगता येणार नाही. पण मला आवडतं म्हणून मी सारं करतो”. स्वामीजी यावर म्हणाले, “याच कारणामुळे मी पण अशी भिक्षावृत्ती स्वीकारून संचार करीत असतो”.

राजेसाहेब हसले. त्यांनी पुढचा प्रश्न विचारला. “स्वामीजी माझा मूर्तिपूजेवर विश्वास नाही. तर माझं काय होईल?” मी धातूची, दगडाची किंवा लाकडाची अशा मूर्तीची पुजा करू शकत नाही. तर मला मरणोत्तर वाईट गती प्राप्त होईल का? या प्रश्नावरून त्यांना पाश्चात्य दृष्टीकोनाचा आणि आधुनिकतेचा अहंकार होता हे स्वामीजींच्या लक्षात आलं होतं. स्वामीजी म्हणाले, “हे पहा, धार्मिक दृष्ट्या ज्याची ज्या मार्गावर श्रद्धा असेल त्याने त्या मार्गाने जावं”.

दिवाण साहेबांच्या घरात राजेसाहेबांचे चित्र भिंतीवर लावलेले होते ते चित्र स्वामीजींनी खाली काढण्यास सांगितलं. सगळे बघत होते की आता स्वामीजी पुढे काय करतात? त्यांना काही केल्या अंदाज येईना. स्वामीजींनी हे चित्र दिवाणसाहेबांच्या समोर धरलं आणि विचारलं, “हे काय आहे?” दिवाण साहेब म्हणाले, “हे महाराजांचे छायाचित्र आहे”. स्वामीजी म्हणाले, “थुंका याच्यावर”. हे ऐकताच, सगळे खूप घाबरले. इतर लोकांकडे वळून स्वामीजी म्हणाले, “तुमच्यापैकी कोणीही यावर थुंका. त्यात काय एव्हढं? तो एक कागद तर आहे”. मग दिवाणसाहेबांना पुन्हा म्हणाले, “थुंका यावर. थुंका यावर”. दिवाणसाहेब न राहवून म्हणाले, “स्वामीजी हे भलतंच काय सांगताय? हे महाराजांचं चित्र आहे. तुम्ही सांगता ते आम्हाला करणं कसं काय शक्य आहे?”           

“ते तर खरच. पण यात प्रत्यक्ष महाराज नाहीत ना. त्यांचं शरीर, अस्थि, मांस, अवयव यातलं काहीही नाही या कागदात. महाराज बोलतात,फिरतात, हिंडतात. तसं काहीच हा कागद करू शकत नाही. पण तरीही तुम्ही त्यावर थुंकण्यास नकार देता. हे तुमचं बरोबर आहे. कारण ते तुमचे महाराज आहेत. त्यावर थुंकणे हा त्यांचा अपमान आहे. असे तुमच्या मनात येते”. महाराजांबद्दल आदरभावनेचा स्वामीजींनी उल्लेख केल्यामुळे उपस्थित लोक जरा मनातून शांत झाले.

मग स्वामीजी महाराजांकडे बघून म्हणाले, “हे पहा महाराज, हा कागद म्हणजे तुम्ही नाहीत. पण दुसर्‍या दृष्टीने पाहिलं तर, त्यात तुम्ही आहात. त्यावर थुंका म्हटलं तर तुमचे विश्वासू सेवक तसं करायला तयार नाहीत. कारण ही तुमची प्रतिकृती पाहिली की, त्यांना तुमची आठवण होते. त्यामुळे ते ज्या आदरभावाने तुमच्याकडे बघतात, त्याच आदरभावनेनं ते या चित्राकडे बघतात. वेगवेगळ्या देवतांच्या धातूच्या, पाषाणाच्या बनवलेल्या मूर्तींची पुजा जे लोक करतात, त्यांची पण हीच दृष्टी असते. ते लोक धातूची किंवा दगडाची पुजा करत नाहीत. ती मूर्ती बघितली की त्यांना परमेश्वराची आठवण होते आणि त्या परमेश्वराची ते पुजा करतात.

मी इतक्या ठिकाणी फिरताना बघितलं की अनेकजण मूर्तिपूजा करताना बघितलंय, पण कोणीही, हे दगडा, मी तुझी पूजा करतो. हे पाषाणा, माझ्यावर दया कर. असं म्हणत नव्हता. त्यांची पुजा किंवा प्रार्थना असते ती त्या मूर्तीच्या रुपानं असलेल्या प्रतिकाच्या मागे उभ्या असलेल्या परमेश्वराची. महाराज आपण लक्षात घ्या, की, प्रत्येक जण प्रार्थना करत असतो ती अखेर त्या विश्वचालक सर्वशक्तिमान प्रभूची. अर्थात हे सारं माझं मत झालं. तुमचं जे काही मत असेल ते तुमचं. त्याबद्दल मी काय बोलू?”

राजे मंगलसिंह अवाक झाले. त्यांनी दोन्ही हात जोडून म्हटले, मूर्तिपूजेकडे कोणत्या दृष्टीने पाहायला हवं याबद्दलचं असं स्पष्टीकरण आजवर मी कधी ऐकलं नव्हतं. आपण माझे डोळे उघडलेत. आपल्या देशावर राज्य गाजवलेलं इंग्लंड, परकीय राज्यकर्ते, त्यांची संस्कृती, त्यांचा ख्रिस्त धर्म याचा त्यावेळच्या सुशिक्षित वर्गावर काय परिणाम होत होता हे स्वामीजींनी कलकत्त्याला असताना अनुभवलं होतं. पण संस्थानिक असलेल्या व्यक्तीवर झालेला परिणाम त्यांना राजे मंगलसिंह यांच्या रूपात पाहायला मिळाला होता.अशा वेगवेगळ्या प्रसंगातून स्वामी विवेकानंदांना अनेक प्रकारची लोकं कळत जात होती. त्यांचा दृष्टिकोन समजत होता. कुठे काय परिस्थिति आहे हे समजत होते. समाज रचनेचा अभ्यास होत होता.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रंगभूमीवरील शिलेदारांची ‘शिलेदारी’ ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

?  विविधा ?

☆ रंगभूमीवरील शिलेदारांची ‘शिलेदारी’ ☆ सुश्री त्रिशला शहा 

(संगीत रंगभूमी गाजवणारी गायिका अभिनेत्री आणि संगीत नाटकाला अवघ जीवन समर्पित करणारी गानसम्राज्ञी किर्ती शिलेदार यांचा जन्मदिवस नुकताच झाला. त्यानिमीत्त हा लेख)

मराठी रंगभूमीला खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस दिसले ते नटसम्राट बालगंधर्व आणि दिनानाथांच्या कसदार अभिनयाने आणि संगीत नाटकातील बहारदार गानशैलीमुळे. या दोन्ही नाट्यकर्मीं मुळे संगीत नाटकाला उत्तुंग शिखरावरील मानाचे स्थान मिळवता आले. बालगंधर्वांच्या तालमीत तयार होऊन त्यांच्याबरोबरीने संगीत नाटकात काम करणारे जयराम शिलेदार आणि जयमाला शिलेदार या व्दयींनी तर संगीत नाटकाला आपले आयुष्य वाहिले. मराठी रंगभूमी हिच आपली कर्मभूमी आणि हाच आपला देव मानून आपल संपुर्ण जीवन संगीत नाटकासाठीचं समर्पित केल.

लहानपणापासून जयराम शिलेदार यांना संगीताची आवड होती, त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी त्यांना गाणं शिकण्याची अनुमती दिली. गाणं शिकता शिकता अभिनयामधेही त्यांना आवड निर्माण झाली आणि बालगंधर्वांबरोबर त्यांना नाटकात काम करण्याची संधी मिळाली. याच दरम्यान त्यांची, नायिका म्हणून काम करणाऱ्या प्रमिला जाधव यांच्याशी त्यांची ओळख झाली,प्रमिला जाधव याही संगीतामधे प्रविण आणि अभिनयातही   निपुण होत्या.जयराम शिलेदार आणि प्रमिला जाधव यांची संगीत नाटकातील वाटचाल अत्यंत यशस्वीपणे चालली होती. याच दरम्यान प्रमिला जाधव या जयमाला शिलेदार बनून जयराम शिलेदार यांच्या आयुष्याच्या जोडीदार बनल्या.

या नंतरच्या काळात दोघांच्याही संगीत नाटकाचा आलेख चढतचं गेला. लता आणि किर्ती अशा दोन गोंडस मुलींमुळे संसारही बहरत गेला. बालपणापासूनच कानावर पडणारे संगीत आणि रंगभूमीवरील आईवडिलांचा अभिनय पाहून नकळत त्यांच्याही मनावर याचा प्रभाव पडत गेला. दोघीही चार पाच वर्षाच्या असताना नाटकातील पात्रांच्या नकला करीत असत, ते पाहून जयराम शिलेदारांनी त्याना अभिनयाचे आणि जयमालाबाईंनी संगीताचे शिक्षण देण्यास सुरु केले.

अशा तालमीत तयार होऊन वयाच्या दहाव्या, बाराव्या वर्षी लता,किर्ती आणि त्यांचा भाऊ सुरेश यांनी ‘संगीत सौभद्र’चा प्रयोग रंगभूमीवर सादर केला. यानंतरची संगीत रंगभूमी, लता आणि किर्तीच्या अभिनयाने खूपचं गाजली. जयमाला बाईंनी अतिशय उत्तम अशी तयारी करुन घेतल्यामुळे संपूर्ण शिलेदार कुटूंबाच्या नाट्यप्रयोगाने संगीत रंगभूमीची भरभराट झाली. या आपल्या लहान लेकींचा संगीताचा प्रवास पाहून शिलेदार पतीपत्नी मनोमन सुखावले. बहिणाबाई चौधरी यांनी एका कवितेत म्हटले आहे,’ माझ्या गं लेकीला, काय देऊ खेळायला, सोन्याची सुपली देते,मोती देते घोळायला ‘ या कवितेप्रमाणे जयमालाबाई म्हणायच्या ‘माझ्या गं लेकींना, काय देऊ खेळायला, नाटकांची सुपली देते, सूर देते घोळायला.’ आणि खरोखरचं या शिलेदारांच्या दोघी लेकींनी नाटकाच्या सुपलीतून सूर अक्षरशः घोळले, खेळवले. सं. सौभद्र, सं. स्वयंवर, सं. मानापमान, एकचं प्याला, सुवर्णतुला, भावबंधन, सं. शारदा, संशयकल्लोळ द्रौपदी वस्त्रहरण अशी एकाहून एक सरस नाटक या शिलेदारांनी रंगमंचावर सादर करुन संगीत रंगभूमीचे भविष्य उज्वल केले. अतिशय उंची गाठणारा लताचा आवाज, थोडासा पुरुषी बाजाचा असल्यामुळे नाटकातील पुरुषप्रधान भूमिका  ती करीत असे. तर अतिशय लिलया असा फिरणारा आवाज आणि अत्यंत उत्कृष्ट साभिनय सादरीकरणाने रसिकांच्या मनावर मोहिनी घालणारा किर्तीचा आवाज, यामुळे संगीत नाटकाला परत एकदा सोन्याचे दिवस आले. किर्ती शिलेदार यांच्या या संगीत नाटकाच्या अपुर्व कामगिरीमुळे त्यांना समोर ठेऊन ‘स्वरसम्राज्ञी’ हे संगीत नाटक लिहले गेले आणि किर्तीताईंनी या नाटकाचे अक्षरशः सोने केले. संपुर्ण भारतभर तसेच इंग्लंड, अमेरिका असे विदेशातही संगीत नाटक पोहोचविण्यात शिलेदार भगिनींचा मोठा वाटा आहे. किर्तीताईंचे नाट्यसंगीत आणि खुमासदार शैलीत केलेल दिप्ती भोगले(लता शिलेदार)यांच निवेदन अशा उत्कृष्ट कार्यक्रमाचे हजारो प्रयोग त्यांनी केले.संगीत नाटकाशिवाय किर्तीताई उत्तम प्रकारे तबला वाजवतात, अशा तबला आणि संगीतावर आधारित ‘ स्वर ताल शब्द संगती ‘नावाच पुस्तक किर्ती शिलेदार यांनी लिहले.अनेक पुरस्कारांच्या मानकरी असलेल्या किर्ती शिलेदार यांना २०१८ च्या ९८ व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्ष पदाचा मान मिळाला. दिल्लीमधील संगीत अकादमीच्या त्या सदस्य आहेत. अतिशय तन्मयतेने आयुष्यभर शिलेदार  कुटूंबाने संगीत रंगभूमीची सेवा केली अस म्हणायला काही हरकत नाही.

काही काही नाट्यगीतांमुळे किर्तीताईंनी प्रेक्षकांना इतकी भुरळ घातली की त्यांच्या कोणत्याही मैफिलीत ही पद त्यांनी सादर करावीत अशी रसिकांची मागणी असायचीच. संगीत कान्होपात्रामधील ‘अवघाची संसार सुखाचा करीन’, सं. स्वयंवरमधील ‘एकला नयनाला विषय तो झाला ‘, नरवर कृष्णासमान’, स्वरसम्राज्ञीमधील ‘कशी केलीस माझी दैना’,अशी कितीतरी पद गाऊन त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केले.’ जोहार मायबाप जोहार ‘ या गाण्याशिवाय तर मैफिल पुर्णच होत नाही.

संगीत रंगभूमीची सेवा करीत असताना किर्तीताईंना अनेक चित्रपटांच्या आँफर आल्या,त्यांचा अभिनय पाहून भालजी पेंढारकर यांनी त्यांना छ.शिवाजी या चित्रपटात जिजाबाईंची भूमिका देऊ केली पण त्यांच मन संगीत रंगभूमीवर इतक जडलं होत की त्यांनी या गोष्टीला नकार दिला आणि आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून या दोघी बहिणी नाट्यजगतातच रमल्या. आयुष्यभर संगीत रंगभूमीचीच सेवा करीत आहेत. लता आणि किर्ती, दोघीही सध्या संगीताचे क्लास घेतातच शिवाय संगीतनाटक यावर किर्तीताई व्याख्यानेही देतात. तर अशीही रंगभूमीवरची शिलेदारांची बहरलेली ‘ शिलेदारी ‘

© सुश्री त्रिशला शहा

मिरज 

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बंधने… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? विविधा ❤️

☆ बंधने… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

बंधनात रहाणे कोणाला आवडते? अर्थातच कोणालाच नाही. एखादी गोष्ट करायची नाही असे बंधन आले की तीच गोष्ट करण्याची अगदी आबालवृद्धांची प्रवृत्ती असते. मधुमेह जडण्यापूर्वी माणसाला गोड खाणे आवडतही नसेल कदाचित, परंतु मधुमेहीअवस्था झाली की त्याला गोड खाण्याचीच लालसा होते. कधी कधी तर तो चोरूनही खातो. सांगायचा उद्देश बंधने झुगारणे ही माणसाची मानसिकता आहे. पिंजर्‍यातला पक्षी फडफड करतो, मग तो पिंजरा सोन्याचा का असेना!साखळीने बांधलेला कुत्रा त्याला सोडविण्यासाठी भुंकून भुंकून त्याच्या धन्याला हैराण करतो. बंध तोडून स्वैर, स्वच्छंद विहार करण्यासाठी प्रत्येकच सजीव आतूर असतो.

ही झाली नाण्याची एक बाजू, परंतु दुसर्‍या बाजूला जीवन जगताना त्यात शिस्त, नियमन असावेच लागते नाहीतर सर्वत्र सावळा गोंधळ आणि अराजक माजेल.

अगदी पार वेदिक कालात आपण पाहीले तर चातुर्वण्य पद्धतीने समाजाची रचना केली गेली होती. ब्राम्हणांनी यज्ञयाग, जपजाप्य, वेद पठण ह्या गोष्टी करायच्या, क्षत्रियांनी रणांगणावर आपली कामगिरी बजवायची, वैश्यांनी व्यापार करायचा आणि शूद्रांनी नगरात स्वच्छता राखायची. कामांची वाटणी केल्याने समाजात सुख, शांती, समाधान नांदेल हा त्यामागील उद्देश. कोणी उच्च, कोणी नीच ही भावना वर्णाश्रम पद्धति अंमलात आणताना नव्हती.

आजही आपण सर्व आवश्यक ती बंधने पाळून जगत आहोत. विद्यार्थीदशेतील बंधने~वेळेत शाळेत गेले पाहीजे, अभ्यास केला पाहीजे, परीक्षा दिलीच पाहीजे, खेळलेही पाहीजे.

विवाह बंधन, आईमुलांचे नाते, भावंडांतील परस्परांचे नाते, मित्रमंडळींशी नातेही सर्व नाती निभावताना काही ठराविक बंधने पाळणे आवश्यक आहे. लग्नाशिवाय स्त्री~पुरुषाचे एकत्र रहाणे हे आपल्या भारतीय संस्कृतीत बसणारे नाही. संसार हेच कितीतरी मोठे प्रिय बंधन आहे. ही बंधने हसत हसत पाळून आपण कर्तव्य पालन करावे.

वेळेचे बंधन पाळणे ही तर यशाची पहिली पायरी आहे. कोणतेही कार्य करताना नियोजन फार महत्वाचे असते. नियोजन नसेल तर कामात सुसुत्रता निच्छितच रहाणार नाही.

निर्मात्याने मानवाआधी निसर्गनिर्मिती केली. त्या निसर्गाचा आणि आपला फार जवळचा संबंध आहे. निसर्ग आपल्याला आवश्यक असलेला प्राणवायू देतो, अन्न देतो, पाणी देतो, जीवन देतो. निसर्गाचा आणि मानवाचा समतोल त्या विधात्याने राखला आहे. एका आवर्तनाच्या बारा महिन्यात उन्हाळा, पावसाळा आणि हिंवाळा असे तीन मुख्य ऋतू त्या निर्मात्याने तयार केले. किती नियमबद्धता आहे त्यात!माणसाने नंतर त्याचे सहा ऋतू केले. पण वातावरणाचे बंधन पाळल्यामुळेच माणसाचे आरोग्य राखले जाते. त्या विश्वंभराची ही योजना आहे. शिशिरात पानगळ झाली की वसंतात  पुन्हा बहर येतो. ऊष्णतेने प्राणीमात्रांची लाही लाही झाली की वर्षा येते आणि सर्वत्र गारवा निर्माण होतो, शुष्क झालेल्या नद्या पुन्हा दुथड्याभरून वाहू  लागतात. निसर्गाने माणसाला आयुष्यातले चढउतार दाखवून दिले आहेत.

बंधने जाचक मात्र कधीही नसावीत. आजही रूढी परंपरा याच्या नावाखाली कित्येक स्त्रियांवर अन्याय होताना आपण पहातो. समाजहितासाठी कायदे केले गेले असले तरी त्यांना धाब्यावर बसवून अत्याचार घडत आहेत. हुंडाबळी अजूनही पूर्णपणे थांबलेले नाहीत. स्त्रीभृणहत्येचे प्रमाण कमी झाले असले तरी खेडोपाडी अजूनही त्या होतच आहेत. हे सर्व पूर्णतया थांबावयास हवे.

बंधने हवीतही आणि नकोतही!

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कृष्णा-(दहीकाल्याच्या निमित्ताने….) ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

?विविधा ?

☆ कृष्णा-(दहीकाल्याच्या निमित्ताने….) ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

कृष्णा, बंदिवासातून स्वातंत्र्याकडे तुझी वाटचाल काल रात्रीपासून सुरू झाली! कंसाच्या बंदिवासात देवकीच्या पोटी जन्माला येताच, दुसऱ्या क्षणी तुला तिथून स्थलांतर करावे लागले! विष्णू अवतारातील एक म्हणून पृथ्वीवर जन्माला आल्या बरोबरच तुला इथले मानवी जीवनाचे वनवास भोगावे लागले आणि गोकुळात जाऊन तू साधा गोपाल म्हणून जगलास ! इतर गोकुळवासी मित्रांबरोबर तुझे खेळ रंगले पण ते करता करताच तू किती राक्षसांचे पारिपत्य केलेस आणि दुष्टांच्या निर्दालनासाठी असलेला तुझा मानवी अवतार कार्यरत झाला ! गरीब बिचाऱ्या गोपांना घरचे दूध,दही, लोणी मिळत नाही म्हणून गोपींची मडकी फोडली. सर्वांसोबत त्यांच्या दही काल्यात रंंगून गेलास आणि समाजवादाचा एक धडा शिकवलास! जे आहे ते सर्वांनी वाटून घ्यायचं !थोडा मोठा झाल्यावर  सांदिपनी ऋषींच्या आश्रमात शिकण्यासाठी गेलास! तेथे गरीब सुदाम्याशी मैत्रीचे बंध ठेवून पुढील काळात त्याचा उद्धार केलास! किशोरावस्था संपून मोठा झालास आणि कंसाचा वध करून मथुऱेचे राज्य मिळवलेस !

 तारुण्यसुलभ भावनेने स्वयंवरासाठी गेलास ,तुला द्रौपदीची आस होती पण पुढे काय घडणार याचे दृश्यरूप बहुदा तुला दिसले असावे!त्यामुळे पांडवांच्या पदरी द्रौपदी देऊन तू तिचा सखा बनलास !दुर्गा भागवत म्हणतात की मित्र या नात्याला ‘सखा ‘हे रूप देऊन स्त्री-पुरुषातील  हे नाते तू अधिक उदात्त केलेस ! आयुष्यभर पांडवांची साथ देत कौरव-पांडव युद्धात तू अर्जुनाचा सारथी बनून कुरुक्षेत्रावर उतरलास योद्धा म्हणून नाही तर   सारथी बनून !एक सहज विचार मनात आला, द्रौपदीने कर्णाला ‘ सूतपुत्र ‘म्हणून नाकारले!सारथ्य करणारा माणूस समाजात खालच्या स्तरावर  असतो हे तिने दाखवून दिले पण शेवटी युद्धात तू सारथी बनून जी  पांडवांना मदत केलीस त्यातून तू सारथी हा सुद्धा किती महत्वाचा असतो हे  द्रौपदीला दाखवून  दिलंस का? तुझं सगळं अस्तित्वच  देवरूप  आणि  मानव  रूप यांच्या सीमेवर होतं!  जन्म घेतलास त्यात तू त्याच रंगाचा रंगून गेलास! मगध देशाच्या लढायांना कंटाळून तू गोकुळ मथुरा सोडून  द्वारकेला पळून गेलास आणि स्वतंत्र राज्य स्थापन केलंस म्हणून तुला रणछोडदास नाव मिळालं! वेगवेगळ्या राज्यातील राजकन्याशी विवाह करून

तू साऱ्या भरत खंडाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केलास! आणि अवतार कार्य समाप्त करताना

एका भिल्लाच्या हातून तुझ्या तळपायाला बाण लागून तुझे जीवन कार्य संपवलेस! कृष्णा, तुझे नाव घेतले की आपोआपच गुणा दोषातून मुक्ती मिळते असं वाटतं !कारण आपण काहीही घडलं तरी ‘कृष्णार्पण’ असा शब्द वापरून ते संपवतो .सगळं हलाहल जणू संपून जातं तुझ्या

स्मरणात! तुझा जन्म काळ मध्यरात्री येतो ,तेव्हाही आम्ही वाजत गाजत तुझा जन्मोत्सव साजरा करतो कारण अंधाराची रात्र संपून तुझ्या जन्माने उत्साहाचा आणि कर्तुत्वाचा जन्म होणार असतो .आजचा गोपाळ काला म्हणजे उत्साही कामाची सुरुवात !पावसाच्या सरी बरोबरच  पुढील वर्ष आनंदात जाऊदे हीच इच्छा! आधुनिकतेच्या नावाखाली कृष्ण – ना किंवा परमेश्वराचे अस्तित्व न माणणारे आता ‘करोना’ पुढे शरणागत झाले आहे आणि आणि त्यावरून विज्ञानाने कितीही मात केली तरी  एक हातचा तुझ्याकडे , परमात्म्याकडे आहे हे मात्र मान्य केले पाहिजे !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! ☆ शालन, मालन आणि मोरू ! (भाग 1) ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? चं म त ग ! 😅

😂 शालन, मालन आणि मोरू ! (भाग 1) 😅 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“पंत, पंत, पंत हे तुम्ही काय चालवलं आहे ?”

“अरे मोऱ्या मी काय चालवलं आहे ते नंतर, आधी मला सांग, किती दिवस झाले आपल्याला भेटून, काय पत्ता काय तुझा?”

“माझा पत्ता तोच आहे, जो गेली पाच वर्ष आहे तो. पंत तुम्हीच सासू सुनेच्या गोष्टीत रमला होतात गेले काही महिने, त्याच काय ?”

“ते जाऊदे रे ! पण आता इतक्या दिवसांनी आलास ते बरंच झाले.”

“का ?”

“हा प्रसाद घे, कालच श्रावणातली सत्यनारायणाची पूजा केली होती, घरातल्या घरात.”

“मी प्रसाद घ्यायला नंतर येतो पंत, माझी अजून अंघोळ व्हायची आहे.”

“मोऱ्या गाढवा, दुपारची जेवायची वेळ झाली तरी अजून तुझी अंघोळ नाही झाली ?”

“हॊ !”

“कारण कळेल मला मोऱ्या ?”

“तुम्ही !”

“अरे मी काय तुला रोज अंघोळ घालायला घरी येतो की काय तुझ्या ?आणि आज आलो नाही म्हणून अजून पारोसा राहिलायस ते ?”

“तसं नाही पंत, पण सकाळ पासून आम्ही नवरा बायको भांडतोय नुसते, त्यामुळे वेळच नाही मिळाला मला अंघोळीला.”

“अरे मोऱ्या पण तुमच्या भांडणाचं कारण काय ?”

“तुम्ही !”

“परत तुम्ही ! अरे काय सारखं तुम्ही, तुम्ही लावलंयस, नीट काय सविस्तर सांगशील की नाही ? आणि असा नुसती लुंगी लावून कसा आलास ? पावसामुळे कपडे वाळले नाही का तुझे ?”

“पंत इथे माझं लग्न मोडायची वेळ आल्ये आणि तुम्ही मला माझ्या कपड्याबद्दल विचारताय ?”

“बरं बाबा नाही विचारात, आता मला सांग तुझं लग्न मोडायची वेळ कुणी आणली बाबा तुझ्यावर ?”

“तुम्ही !”

“मी ? आणि ती कशी काय बुवा ?”

“सांगतो, आपल्या सोसायटीची पावसाळी पिकनिक जाणार आहे १२ सप्टेंबरला, बरोबर ?”

“हॊ, मीच सगळी व्यवस्था करतोय त्याची, जवळ जवळ ६० लोकांचे प्रत्येकी १,५००/- रुपये पण जमा झालेत ! आणि तुमच्या दोघांचे पैसे सुद्धा आलेत बरं का पावसाळी पिकनिकचे.”

” हॊ ना, मग हे सगळं शालनला सांगा !”

“मी कशाला सांगू सुनबाईला, तू नाही  सांगितलंस ?”

“सांगितलं ना ! पण तिचा विश्वास बसायला तयार नाही.”

“का ?”

“अहो आज सकाळी उठल्या उठल्या  मला म्हणते १,५००/- रुपये द्या आधी, मला सोसायटीच्या पावसाळी पिकनिकला जायचं आहे !”

“अरे पण तू तर सुनबाईचे आणि तुझे पिकनिकचे पैसे कधीच भरलेस, हे मी तुला आत्ताच सांगितलं ना ?”

“हॊ पंत, पण ती मला म्हणाली, तुम्ही माझे कुठे पैसे भरलेत पिकनिकचे ? तुम्ही तर त्या सटविला घेवून जाणार आहात ना पिकनिकला आणि लागली भांडायला.”

“आता ही सटवि कोण मोऱ्या ?”

“मालन !”

“कोण मालन ?”

“मला काय ठाऊक ?”

“अरे तू आत्ताच तीच नांव सांगितलंस ना मला मालन म्हणून ?”

“हॊ पंत, पण तुम्ही ते मला सांगितलंत म्हणून, मी ते नांव तुम्हाला सांगितलं.”

“असं कोड्यात बोलू नकोस मोऱ्या गधडया. मी कधी तुला सांगितलं मोऱ्या?”

“अहो पंत, तुम्ही या पावसाळी पिकनिकसाठी व्हाट्स अपचा एक वेगळा ग्रुप बनवला आहे आपल्या सोसायटीचा, हॊ की नाही ?”

“हॊ !”

“त्यात ज्या, ज्या लोकांनी पावसाळी पिकनिकसाठी पैसे दिलेत त्यांची नांव आणि इतर माहिती दिली आहे, बरोबर ?”

“अगदी बरोब्बर मोऱ्या !”

“इथंच लफड झालं पंत !”

“कसलं लफड ?”

“अहो पंत, तुम्ही माझ्या नावापुढे माझ्या बायकोच नांव म्हणून मालन असं टाकलं आहे, शालनच्या ऐवजी!”

“अच्छा, अच्छा असा घोळ झालाय तर !”

“पंत नुसता घोळ नाही, महाघोळ घातलाय तुम्ही. तुमच्या एका ‘शा’च्या ऐवजी ‘मा’मुळे ध चा मा करणाऱ्या आंनदीबाईच्या पंक्तीत तुम्ही जाऊन बसलात आणि मला आता ‘पंत मला वाचवा वाचवा’ असं गार्द्याऐवजी, शालन माझ्या मागे लाटण घेवून लागल्यामुळे ओरडायची वेळ आल्ये माझ्यावर, त्याच काय ?”

“त्यावर माझ्याकडे एक उपाय आहे मोऱ्या.”

“कोणता पंत ?”

“मी एक काम करतो, सुनबाईला फोन करून माझी चूक कबूल करतो आणि तू दुसरं एक काम कर.”

“काय ?”

“बायकांचा वीक पॉईंट काय सांग बघू.”

“नवीन साडी खरेदी, दुसरं काय.”

“बरोब्बर, म्हणून तू माझ्या चुकीमुळे तुला झालेला त्रास कमी करायला सुनबाईला नवीन साडीच प्रॉमिस करून टाक, म्हणजे बघ तिचा राग कुठल्या कुठे पळून जाईल ते !”

“म्हणजे हे बरं आहे पंत, चूक तुम्ही करायची आणि माझ्या खिशाला खड्डा !”

“खड्डा ? कसला खड्डा ?”

“अहो आता नवीन साडी घ्यायची म्हणजे तीन चार हजार गेले ना.”

“मोऱ्या, मी तुला काय सांगितलं ते तू नीट ऐकलं नाहीस.”

“अहो तुम्हीच सांगितलंत ना शालनचा राग घालवायला तिला नवीन साडी घे म्हणून ?”

“बघ तू परत चूक करयोयस.”

“कसली चूक पंत ?”

“मोऱ्या मी म्हटलं तिला नवीन साडी घ्यायच ‘प्रॉमिस’ कर, नवीन साडी कुठे घे म्हटलं ?”

“म्हणजे ?”

“अरे फक्त प्रॉमिस करायच, आपल्या नेत्यां सारखं ! त्याने सुद्धा सुनबाईचा राग जावून ती खूष होते की नाही बघ.”

“कमाल झाली तुमची पंत, आत्ताच घरी जातो आणि तुमचा उपाय अंमलात आणतो. येतो मी पंत. “

“जा वत्सा, तुजप्रत कल्याण असो !”

© प्रमोद वामन वर्तक

१९-०८-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares