मराठी साहित्य – मी प्रवासीनी ☆ सुखद सफर अंदमानची… मड व्होल्कॅनो – भाग – ४ ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

? मी प्रवासीनी ?

☆ सुखद सफर अंदमानची… मड व्होल्कॅनो – भाग – ४ ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

मड व्होल्कॅनो 

व्होल्कॅनो अर्थातच ज्वालामुखी हा तसा परिचित शब्द. पण मड व्होल्कॅनो हा काहीसा वेगळा शब्द. आमचं कुतूहल चांगलंच चाळवलं गेलं होतं. आज अंदमानच्या मुक्कामाचा शेवटचा दिवस होता. रामनं, (आमचा टूर लिडर) रात्री झोपताना निक्षून सांगितलं होतं की भल्या पहाटे तीन वाजता आपण हॉटेल मधून बाहेर पडणार आहोत. जो बरोबर तीन वाजता बस मध्ये नसेल त्याला न घेता बस निघेल.पावणेतीन वाजताच आम्ही सगळे हॉटेल लाऊंजमध्ये हजर होतो. 

वीर सावरकरांना मानवंदना करून, बाप्पाच्या जयजयकारात प्रवास सुरू झाला. आमच्या हॉटेलपासून साधारण अडीच तास प्रवास करुन आम्ही मध्य अंदमानला आलो. इथं जलडमरु बॉर्डरवर बाराटांगला जाण्यासाठी गेट आहे. हे गेट सकाळी सहा वाजता व नऊ वाजता उघडते. दुपारी तीन वाजता ते बंद होते. बारटांगला जाणारा रस्ता जंगलाच्या अशा भागातून जातो जेथे आदिवासी लोकांचा भाग आहे. जारवा जातीच्या या आदिवासींच्या सुरक्षिततेकरता हा भाग प्रतिबंधित आहे. गेटवर आधारकार्ड (परदेशी प्रवाशांना पासपोर्ट ) दाखवावे लागते. मगच प्रवेश करता येतो. 

आपण फार लवकर आपली झोप सोडून आलोय.  गेटवर आपलीच बस पहिली असेल हा भ्रमाचा भोपळा तिथं पोचतात फुटला. आमच्या पुढे एकशे छत्तीस गाड्या होत्या. रस्त्याच्या दुतर्फा चहाचे स्टॉल्स होते. गरमागरम मेदूवडे आणि डाळवडे तयार होते. पट्टीचे खाणारे मात्र हवेत. 

आदिवासी पाड्यातील जारवा लोक रस्त्यात दिसण्याची शक्यता होती. ते लुटारू आहेत असं ऐकलं होतं. या रस्त्यावर बसच्या वेगाला मर्यादा आहे. कारण क्वचित एखादा प्राणी रस्त्यावर आलेला असू शकतो. जारवांना बघून उत्साहित होऊन काही करायचं नाही. हात हलवायचा नाही. थांबायचं नाही. फोटो काढायचा नाही. त्यांना काही खाऊ द्यायचा नाही. अशा सूचनांचे फलक रस्त्यावर लावलेले आहेत. आम्हाला कोणताच वाईट अनुभव आला नाही. परतीच्या प्रवासात आम्हाला जारवांचे बच्चू दिसले. एक दोन नाही तर सहा बच्चू. काळीकुळकुळीत, उघडबंब, कोरीव शिल्पासमान ती सहा कोकरं रस्त्याच्या कडेला ओळीनं उभी होती. हसरे चेहरे, काळेभोर टप्पोरे डोळे बसकडे मोठ्या आशेनं बघतायत का? 

खूप कडक सूचना दिल्या गेल्या होत्या. आम्ही सर्वांनी त्या पाळल्या. 

जारवा ही आदिवासी भागात राहणारी जमात. दक्षिण आणि मध्य अंदमानच्या पश्चिम किनारपट्टीवरील जंगलात यांची वस्ती आहे. बांबू, नारळाच्या झावळ्या, काठ्या यापासून घरं बांधून राहतात. घर नव्हे खरंतर झोपडीवजा आडोसा म्हणावा. हे निसर्गाशी एकरूप होऊन गेले आहेत. निसर्गाचे नियम त्यांना मान्य आहेत आणि ते काटेकोरपणे पाळले जातात. त्सुनामी मध्ये हे लोक मृत्युमुखी पडले नाहीत. या संकटाची कल्पना त्यांना आधीच आली असावी. फळं कंदमुळं मासे हे त्याचं प्रमुख अन्न. न शिजवता कोणतीही प्रक्रिया न करता हे लोक अन्न खातात. मीठ मसाला तेल यांचा वापर न करता आपण ज्याला ब्लाण्ड म्हणतो तसं अन्न ते घेतात. आपल्या जगातील आधुनिक तंत्रज्ञानापासून कोसो दूर आहेत हे लोक. त्यांना त्याची काही गरजही नाही. पण भारत सरकार त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. अलिकडेच एकोणीस जारवांना त्यांचे ओळख पत्र दिले गेले आहे. 

जेटीवर पोचतात आम्ही बसमधून उतरलो आणि एका मोठ्या क्रूझ मध्ये चढलो. आमची बस आणि काही गाडय़ा या क्रूझमध्ये चढवल्या गेल्या. चारशे पाचशे माणसं बसू शकतील अशी क्रूझ अर्धा पाऊण तास प्रवास करुन बारतांग बेटाला लागली. तिथून पुढे आम्ही छोट्या छोट्या जीपनं बॅरन बेटावर गेलो. जाताना वाटेत आदिवासी आणि त्यांची वस्ती दिसत होती. आता साधारण पंधरावीस मिनिटांचा ट्रेक होता. टेकडीवजा रस्त्यानं चढ चढून आम्ही माथ्यावर पोचलो. आजूबाजूला चढताना थोडी झाडी होती. पण दाट जंगल नव्हते. माथ्यावर पोहोचल्यावर मात्र स्तंभित झालो आम्ही. कारण समोर ठिकठिकाणी चिखलाचे ज्वालामुखी दिसत होते. हे ज्वालामुखी सक्रिय नव्हते. तरी त्यातून हळुहळू बुडबुडे येताना दिसत होते. काही लहान काही मोठे. चिखलाचे लहान मोठे डोंगर किंवा ढीग म्हणावेत . आणि प्रत्येक डोंगराच्या टोकावरून हलकेच येणारे बुडबुडे. निसर्गातला हा चमत्कार बघताना मन थक्क होतं. निसर्ग पोटात काही ठेवून घेत नाही. काही सजीवांचे निर्जीव घटकांचे पृथ्वीच्या पोटात खोल कुठेतरी विघटन होत आहे. त्या विघटनात उत्सर्जित होणारे काही वायू बाहेर पडताना स्वतःबरोबरच तिथला थंड झालेला चिखलाचा ज्वालामुखी घेऊन बाहेर पडतात. विश्वंभरानं किती विचार करून हा खेळ मांडला आहे. किती जटील आणि गुंतागुंतीची रचना केली आहे. आणि ती जटीलता सोपी करण्याचे मार्ग देखील तयार केले आहेत. गुंतागुंतीची कोडी तितक्याच हलक्या हातानं नाजूक बोटांनी कुशलतेने सोडवली आहेत. म्हणूनच तर आपण सुरक्षित आनंदी जीवन जगत आहोत. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची… 

– क्रमशः भाग चौथा

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासीनी ☆ सुखद सफर अंदमानची… भाग – ३ ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

? मी प्रवासीनी ?

☆ सुखद सफर अंदमानची…  भाग – ३ ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

चुनखडीच्या गुहा 

बारतांगच्या धक्क्यावर लहान स्पीड बोटीतून आमचा प्रवास सुरु झाला. एका बोटीत दहा जणं बसून जाऊ शकतो. निळाशार खोल समुद्रात वेगानं जाणाऱ्या या बोटीतून जाताना भारी मजा येते. वारा वहात असतो आणि त्याला छेद देत मोटरबोट सागरी लाटांवर स्वार होते. नावाडी कौशल्यपूर्ण असतात. या बोटींची नावं मजेशीर आहेत. सी टायगर, सी मेड, इ. ज्या बोटीतून तुम्ही जाल त्याच बोटीतून परत यायचं असतं. त्यामुळे बोटीचं नाव आणि नावाड्याचं नाव लक्षात ठेवावं लागतं.

समुद्राच्या लाटा एका लयीत उठत असतात. पण आपल्या बोटीमुळं त्यांना छेद जातो. त्यांचा ताल बिघडतो. लय वाढते. लाटांची उंची, हेलकावे सगळं उसळी मारून आपल्या बोटीकडं झेपावतं. आपल्या आजूबाजूनं दुसरी आणि एखादी स्पीड बोट जात असेल तर लाटांचा खेळकरपणा वाढतो. त्या आपल्या बोटीला जास्तच झोके देतात. सप् कन पाण्याचा किंचित जोरदार फटकारा देतात. हलणारं निळं पाणी आणि लाटांमुळं फेसाळलेल्या पाण्यातील शुभ्र फेसांची माळ. शुभ्र चमकणारे मोती. निळ्या लाटांना त्यांची मध्येच जुळणारी तुटणारी झालर. रमणीय दृश्य असतं ते. वरती पसरलेलं घनगंभीर अलिप्त आकाश अधिक निळं अधिक समंजस आणि शांत वाटतं. हा खाली पसरलेला निळाशार समुद्र मात्र अवखळ चंचल अनाकलनीय तरीही गूढ वाटतो.

बराच वेळ लांबवर दिसणारं खारफुटींचं जंगल आता दोन्ही बाजूंनी जवळ जवळ येऊ लागतं. आणि अचानक ते अंतर इतकं कमी होत जातं की आपली बोट खारफुटीच्या घनदाट छताखालून जाऊ लागते. हे छत इतकं दाट आहे की आता आकाशाची निळाई लुप्त होते. आकाश आणि समुद्र यातल्या निळ्या रंगाची तुलना करण्याचं कारण रहात नाही. कारण आता आपल्या डोक्यावर निसर्गराजा हिरवी छत्री धरून उभा असतो. हिरवाई इतकी सलगी करते की पाण्याची निळाई हरवून जाते. आता लाटांचा खेळ आणि लाटांचं संगीत दोन्ही शांत होतं. आपली बोट शांतपणे एका बेटाच्या लहानशा लाकडी धक्क्याला लागलेली असते.

आता सुरू होतो आपला पायी प्रवास. साधारण पणे अर्ध्या तास चालावं लागतं फारतर. पण ही वाट दाट जंगलातून जाते. या पायवाटेनं जाणं तसं फार कठीण नाही पण सोप्पंही नाही. दोन्ही बाजूला खारफुटींची घनदाट झाडी. झाडांची मुळं इतस्ततः पसरलेली. ही मुळं आपल्या डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे जातात. त्यांच्या या रांगत रांगत इकडून तिकडे जाण्यानंच नैसर्गिक पायऱ्या तयार झाल्या आहेत. काही ठिकाणी मात्र दगडांचा वेडावाकडा चढ उतार आहे. सगळा रस्ताच चढ उतारांनी बनला आहे. एक दोन ठिकाणी प्रचंड मोठे वृक्ष पायवाटेत मध्यभागी ठिय्या देऊन बसले आहेत. त्यांच्या दोन्ही बाजूला पायवाट आहे. या गर्द दाट हिरव्या रंगातून सूर्यकिरणांना सुद्धा आत यायला मज्जाव करण्यात आला आहे. एक हिरवी शांतता गारवा वाहून आणते जणू. मंद शीतल वारा उष्णता जाणवू देत नाही. सोबतीला असतं पानांचं सळसळतं संगीत आणि नयनमनोहर पक्ष्यांची मधुर सुरावट. त्यांचे आलाप आणि ताना ऐकत आपण गुहेजवळ कधी जातो ते कळत नाही.

गुहा सुरू झाली आहे हे आपल्याला आपला वाटाड्या सांगतो. त्याचं कदाचित आणखी एक कारण असेल. ते म्हणजे या गुहेचा पहिला साठ टक्के भाग वरुन उघडा आहे. दोन्ही बाजूस चुनखडीचे उंच डोंगर. आकाशाकडं निमुळते होत जातात आणि वरच्या बाजूला छतावर ते डोंगर एकमेकांपासून विलग झालेले दिसतात. अर्थात या भागात पुरेसा उजेड आहे. पाय जरा जपून ठेवावा लागतो. खालचा रस्ता खाचखळगेवाला आणि वरखाली करत आतल्या गुहेत नेतो. हा बाहेरचा भाग चुनखडीचा असूनही काळा दिसतो. हवा पाणी यांच्या संपर्कात आल्यानं चुनखडीचा पांढरा रंग बदललेला आहे. इथून पुढे गुहेच्या आतील चाळीस टक्के भाग कमी उजेडाचा आहे. गुहेत आत जाऊ तसतसा काळोख दाट होतो. या गुहेतील पुढचा प्रवास मोबाइल टॉर्चच्या उजेडात करावा लागतो. परंतु इथल्या डोंगराच्या भिंती पांढऱ्या आहेत. या भिंतींना हात लावायचा नाही. हाताचा स्पर्श जिथं झाला आहे तिथं त्या काळ्या झाल्या आहेत.

वाटाड्या दाखवत जातो तसं आपण फक्त बघत आत जायचं. चुनखडीच्या क्षारांचे एकावर एक अनेक थर या भिंतीवर जमले आहेत. दोन्ही बाजूच्या भिंती आकाशाकडं निमुळत्या होत जातात आणि शेवटी एकमेकींना मिळालेल्या दिसतात. काळोख वाढत जातो. चुनखडीचे थर चित्र विचित्र आकार धारण करतात. आपली जशी नजर तसे आकार किंवा आपल्या मनात जो भाव तसा दगड. इथं दगडानं कधी बाप्पाच्या सोंडेचा आकार धारण केला आहे तर कधी फक्त सोंडेचा. कुठं चुनखडीतून पद्म फुललंय तर कुठं कमळपुष्पमाला. कुठं मानवी नाकाचा, चेहऱ्याचा भास तर कुठं मानवी पाठीचा कणा. स्पायनल कॉर्ड. तो इतका हुबेहुब की आ वासून बघतच रहावं. मणक्यांची खरी माळच कुणा प्रवाशानं आणून ठेवली नसावी ना? असा विचार मनात आल्या शिवाय रहात नाही. एके ठिकाणी एक दगड छतातून खालच्या दिशेनं वाढतोय तर त्याखाली दुसरा जमिनीतून छताच्या दिशेने. दोन्हीमध्ये एखादी चपटी वस्तू जाऊ शकेल इतकं कमी अंतर. काही वर्षांनी येणाऱ्या प्रवाशांना एकसंघ खांब दिसला तर नवल नसावं. काही ठिकाणी अजूनही थर बनवण्याचं, क्षार साचण्याचं काम सुरू आहे. त्या जागा ओलसर दिसतात. टपकन एखादा पाण्याचा थेंबही आपल्या अंगावर पडतो. काही थरांमध्ये अभ्रकाचं प्रमाण जास्त आहे. ते अंधारात चांदण्यागत चमकतात.

निसर्गाची लीला अजबच याची पक्की खात्री करून देणाऱ्या या गुहा. नजरबंदी करणाऱ्या नैसर्गिक सौंदर्याचा, निसर्गाच्या अदाकारीचा थाट लेवून उभ्या आहेत. एक गूढ वातावरण घेऊन. रम्य आणि अजब आकारांचं हे निसर्ग दालन किती सजीवांचं आश्रय स्थान होतं कोण जाणे. किंवा अजूनही असेल माहिती नाही. गुहेतून फिरताना समुद्राची गाज कानावर येत राहते. ती गाजच काय तेवढी तिथल्या गूढ शांततेचा भंग करते पण गूढता अधिकच गूढ करते.

या गुहांच्या पलिकडे आणखी गुहा आहेत. ज्या स्तरसौंदर्याच्या खाणी आहेत. परंतु तो रस्ता बंद झाला आहे. शिवाय इथं अंधार लवकर पडतो. बारटांगचं गेट दुपारी तीन वाजता तसंच चार वाजता उघडतं. त्यावेळेत पोचायला हवं. पाय उचलावेच लागतात. गूढ रहस्याचा शोध न लागल्यासारखे आपण परतू लागतो.

– क्रमशः भाग तिसरा 

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासीनी ☆ सुखद सफर अंदमानची…  भाग – २ ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

? मी प्रवासीनी ?

☆ सुखद सफर अंदमानची… भाग – २ ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

फ्लॅग पॉईंट 

श्रीविजयानगर, अर्थात पोर्ट ब्लेअर.

वीर सावरकर हवाई अड्ड्यावर पंधरा जानेवारीला सकाळी साडे सहा वाजता आम्ही उतरलो. वीर सावरकर हवाई अड्डा हे नाव वाचताना मराठी असल्याचा अभिमान वाटला. समोरचा सावरकरांचा पुतळा बघून नतमस्तक होणार नाही असा एकही मराठी माणूस मिळणार नाही.

अंदमान निकोबारची राजधानी असलेलं हे ठिकाण. या मातीत पाऊल ठेवताना मान ताठ होते. उर देशाभिमानानं दाटून येतो 

30 डिसेंबर 1943 ला इथं नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा तिरंगा फडकावला. अंदमान ब्रिटिश राजवटीतून मुक्त झाल्याची वार्ता हा तिरंगा सगळ्या जगाला सांगत होता. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी नेताजींच्या सेनेनं अंदमान स्वतंत्र केलं होतं. तो Flag point बघायला आम्ही संक्रातीच्या सरत्या संध्यासमयी गेलो होतो. काही वेळा पूर्वी सेल्युलर जेल बघून आलो होतो. अजून ते बघताना अंगावर आलेले रोमांच तसेच होते. स्वातंत्र युद्धाचा तो दैदीप्यमान इतिहास आणि तो काळ नजरेसमोर बिनचूक उभा करणारा तो लाईट एँड म्युझिक शो यांचा मनावर आणि शरीरावर झालेला परिणाम तेवढाच तीव्र होता. साखळदंडाचे आवाज कानात घुमत होते. इंग्रज अधिकाऱ्यांचे गडगडाटी सातमजली हास्य विसरणं शक्यच नव्हतं. जेलच्या प्रांगणातील पिंपळाच्या पानांची सळसळ धमन्यांतून वाहणाऱ्या रक्तात भिनली होती. हा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी आजच्या भारतीयांना तो ऐकवण्यासाठी हा पिंपळ इथं ताठ उभा आहे. जाज्वल्य देशाभिमान असाच प्रज्वलित ठेवणाऱ्या पटांगणातील त्या दोन अखंड हुतात्मा ज्योती प्रत्येक भारतीय मनात हा इतिहास जागा ठेवतात. सात बाय साडेतीनची ती अंधारी कोठी, तिथंच जेवण, तिथंच झोप, शारीरिक विधींसाठी वेगळी व्यवस्था नाही. तांबरलेल्या लोखंडी थाळीत वाढलेलं बेचव कोरडं अन्न ज्यात अळ्या आणि किड्यांचं साम्राज्य. नाक दाबून प्यावं तरी पिऊ शकणार नाही असं घाणेरडा वास असलेलं पाणी प्यायला. हे सगळं कमी म्हणून दिवसभर शेकडो हजारो शहाळी सोलणं, काही टन तेल काढण्यासाठी कोलू ओढणं, पाठीवर आसूडाचे फटके झेलणं. हे सगळं कशासाठी तर मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी. आपल्याच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्याच देशात असंख्य कोवळ्या हातांनी कोलू ओढले. साखळदंडांनी बद्ध असलेल्या हातापायांनी, ज्या बेड्या हालचाल केल्यास 

हातापायांना जखमा करत असत. नुसतं ऐकून श्वास रोखला जातो, मन बधीर होतं. वेड लागेल असं वाटतं. पण हा सिनेमा नाही. किंवा ही काही काल्पनिक कथा कादंबरी नाही. हा खराखुरा इतिहास आहे स्वातंत्र्य चळवळीचा, हे सत्य आहे बलिदानाचं, ही सत्यकथा आहे वेड्या साहसी वीरांची. आज त्यांच्या मुळंच आपण स्वतंत्र भारतात ताठ मानेने जगू शकतो.

150 फूट उंच तिरंगा वाऱ्यावर लहरत होता. समुद्राच्या लाटा ओढीनं त्याच्या चरणाकडं धाव घेत होत्या. त्याला स्पर्श न होऊ देता ध्वजस्तंभापासून काही अंतरावर येऊन पुन्हा समुद्रमय होत होत्या. त्यांचा लयबद्ध आवाज गंभीर तरीही मोदमय होता. अभिमानानं जणू वंदे मातरम म्हणत असाव्यात. बंगालचा उपसागर अजूनही तो दिवस विसरला नाही. 2018 मध्ये पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा तिथं ध्वजारोहण केलं आणि नेताजींना आदरांजली म्हणून या फ्लॅग पॉईंटचं पुनर्निर्माण पुनर्जीवन केलं. आज तो पॉईंट एक देखणं प्रेक्षणीय स्थळ आहे. इथं छानशी चौपाटी आहे. आमच्यातल्या एकीचा, सौ स्वाती मेहता हिचा वाढदिवस त्या दिवशी होता. तिरंग्याच्या साक्षीनं तो साजरा झाला. अहो भाग्यम्!! आपल्या तीन मुलींना घेऊन स्वतःच्या लग्नाची एनिव्हर्सरी साजरी करायला अंदमानला येण्याची कल्पना केवढी रोमांचकारक. पण… पण ती पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभलं किंबहुना ती कल्पना प्रत्यक्षात आली ते आणि ते केवळ या वीरांच्या समर्पणानं, त्यागानं, अचाट देशप्रेमामुळंच हे विसरून चालणार नाही.

सरसरला शहारा सरसर अंगावर 

नतमस्तक मी वीराच्या त्या भूमीवर 

*

झेलले अनेक वार 

सोसले तुम्ही अत्याचार 

अनंत यातनांचे अंगार 

दाहक अग्नीफुलांचे हार 

*

न थिजे तव बुद्धीची धार 

शब्दच लवती बनून तलवार 

ती कोळशाची लेखणी धारदार 

भिंतीवर फुलले अक्षरांचे अंगार

*

अवांछनीय मिळे तुज जलनीर 

आरास किड्यांची, शोभला थाळीचा तीर

झेलले असंख्य अगणित भाले टोकदार 

तरी न ढळला निश्चय तू धीरवीर 

*

थंड बोचरे काळेपाणी 

आईची ममता जागी गाणी 

पेटता मग लाव्हा त्या धमनी 

थिजली काळरात्रही त्या अंदमानी 

*

केले यशस्वी तुम्ही संक्रमण 

फिरंगी पळविले करून आंदोलन 

तव त्यागाची ठेवून आम्ही जाण 

नतमस्तक होऊन लुटतो मुक्तक्षण 

*

सरसरला शहारा सरसर अंगावर 

नतमस्तक मी त्या वीराच्या भूमीवर 

– क्रमशः भाग दुसरा 

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ सुखद सफर अंदमानची…  भाग – १ ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

☆ सुखद सफर अंदमानची…  भाग – १ ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सेल्युलर जेल 

विहार ट्रॅव्हल्स सोबत आम्ही पोर्ट ब्लेअरच्या विमानतळावर पाऊल ठेवलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा घाम ज्या भूमीवर गळला त्या भूमीवर आपण उभे आहोत ही भावना आमच्यातल्या प्रत्येकाच्या मनात होती. भारतीय असल्याचा अभिमान सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. समोर होता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पूर्णाकृती पुतळा. त्या पुतळ्याच्या पायथ्याशी उभं राहिलं की समोर दिसतात 

देवनागरी लिपीतील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा ही अक्षरं. हे नाव वाचताना मान आणि खांदे दोन्ही अभिमानानं ताठ होतात. भारतभूमीचा हा हिस्सा कुणा इंग्रज अधिकाऱ्याच्या नावानं असावा ही किती दुर्दैवी गोष्ट होती. पण आता बदल होतोय. इथली सगळी बेटं कात टाकलीय जणू. भारतीय नावांनी ओळखली जाऊ लागली आहेत. एक फोटो इथं घेतला जातोच.

इथं बघण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. दुपारी आम्ही समुद्रिका मरिन म्युझियम बघितलं. या ठिकाणी अंदमानच्या समुद्रात मिळणारे अनेक सागरी प्राणी ठेवले आहेत. काचेच्या पेटीतील, नैसर्गिक वातावरणात ठेवलेले हे सजीव छोटीशी समुद्र सफर करवून आणतात. निळ्या समुद्राखालच्या अनोख्या रंगीबेरंगी दुनियेत हरवून न जाल तरच नवल. शार्क माशाच्या हाडांचा मोठा सांगाडा आपलं स्वागत करतो. सावरकरांच्या भेटीची वेळ ठरलेली असते. त्यामुळे मस्य दुनियेतून बाहेरच्या जगात पाऊल ठेवावेच लागते. पुढील भेट जास्त महत्त्वाची असते.

आज राष्ट्रीय स्मारक असलेले सेल्युलर जेल, खरंतर ब्रिटिशांनी बांधलेला तुरुंग आहे. या तुरुंगाची रचना सायकलच्या चाकासारखी आहे. (ओक्टोपस या प्राण्यासारखी) या रचनेला पॅनोप्टिकॉन म्हणतात. एकोणीसाव्या शतकातील इंग्लंडमधील महान तत्त्वज्ञ बेंथमन यानं ही रचना सुचवली होती. इमारतीच्या मध्यभागी एक उंच टॉवर आहे ज्यावर चोवीस तास एक पहारेकरी असतो. या टॉवर वर एक घंटा आहे. ही घंटा वाजताच उठण्याची सक्ती होती. घंटा सुर्योदय होण्यापूर्वीही वाजे. दमलेल्या कैद्यांची झोप पूर्ण होण्यापूर्वीच. या टॉवरभोवती सायकलच्या स्पोक्सच्या आकारात सात इमारती. प्रत्येक विंगला तीन मजले आहेत. प्रत्येक मजल्यावर छोट्या छोट्या खोल्या. जणूकाही सजीवांच्या शरीरातील पेशी. या खोल्यांची संख्या सातशे. पण रचना अशी की इतर खोल्यांमधील कैदी बिल्कुल दिसत नाहीत. आपण समाजप्रिय आहोत. त्यामुळं आपल्या आजूबाजूला असणारे इतर कैदी दृष्टीस न पडणं हे सुद्धा खूप त्रासदायक ठरत असेल. आपल्या शरीरातील पेशींमध्ये देवाणघेवाण होत असते. या जेल मधील सेल्स मध्ये मात्र कोणत्याही प्रकारचा संपर्क साधता येत नसे. कैद्यांनी एकमेकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न जरी केला तरी कठोर शिक्षा होत असे.

या जेल मधील प्रत्येक सेलची, लांबीरुंदी ४. ५मीटर×२. ७मीटर(१४. ८फूट×८. ९फूट) एवढीच आहे. तीन मीटरवर (९. ८फूटावर) फक्त एक खिडकी आहे. जेवणाचा दर्जा अतिशय निकृष्ट. एका पसरट लोखंडसदृश्य धातूच्या भांड्यात कसलं तरी हिरवट पाणी मिळत असे. त्यात किडे अळ्या पडलेल्या असत. पिण्याचं पाणी शारीरिक स्वच्छतेसाठी सुद्धा वापरू शकणार नाही इतकं घाण, गटारगंगेसारखं. वास सहन न होणारं. कैद्यांना कोलू ओढून तेल काढावं लागत असे. नारळ सोलावे लागत. साखळदंड बांधलेल्या अवस्थेत ही कामं विश्रांती न घेता करणं फारच कठीण होतं. त्यांना जर कोणी कामचुकारपणा करतोय असं वाटलं किंवा दिवसभरात दिलेल्या प्रमाणात तेल गाळलं गेलं नाही अथवा नारळ सोलले गेले नाहीत तर कोडे मारले जात. हात वर केलेल्या अवस्थेत पाठीवर, पायावर हे कोडे पडत. तरीही काम न झाल्यास, बंडखोरी केल्यास दोन पायांत आडवी काठी ठेवली जाई. मार तर खावाच लागे पण पाय जवळ घेता येत नसत.

शिक्षा जीवघेणी तर होतीच. निकृष्ट अन्न, पाणी, यांनी आजारपण ठरलेलंच होतं. अन्नत्याग केला किंवा उपोषण केलं तर जरबीनं नाकातून नळीनं दूध घातलं जाई. या धडपडीत फुफ्फुसात दूध जाऊन काही स्वातंत्र्यवीरांचा मृत्यू झाला आहे. या गोष्टी लपवल्या जात. काहींना वेडं ठरवलं गेलं तर काही खरंच स्वतःचं भान विसरून मानसिक स्वास्थ्य हरपून बसले.

याच परिसरात फाशीघर आहे. एक म्युझियम आहे जिथं, कोलू, साखळदंड, आसूड इ. ठेवले आहे. हे बघताना मानसिक यातना न झाल्या तर नवलच. इथं भेट देणारी एकही व्यक्ती अशी सापडणार नाही जिच्या डोळ्यात पाणी आलं नाही, मन भरून आलं नाही, देशाभिमान आणि स्वातंत्र्यवीरांच्या अभिमानानं उर भरून आला नाही. या इतिहासाची साक्ष देत उभा असणारा पिंपळ सुद्धा आपल्या सगळ्यांचं दैवत बनतो. इथल्या हुतात्मा स्मारकासमोर आपण नतमस्तक होतो. गुडघे टेकून इथली माती कपाळाला लावतो. जड पावलांनी, जड ह्रदयानं आणि त्याहून जड मनानं तिथून बाहेर पडतो…कदाचित एक मन तिथंच ठेवून…

– क्रमशः भाग पहिला 

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ “चला बालीला…” – भाग – ७ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “चला बालीला…” – भाग – ७ ☆ सौ राधिका भांडारकर 

आज सकाळीच सतीश ने टी टेबलवर एक मस्त एक्सायटिंग घोषणा केली. “आजचा कार्यक्रम आहे बाली हाय क्रुझ. आपण सनसेट डिनर क्रुझ बुक केली आहे.”

वाॅव! बाली आणि समुद्र सफारी शिवाय परतायचे हे केवळ अशक्य!

बाली बेनोवा बंदर (जिथून  आमची क्रुझ सुरू होणार होती) आमच्या वास्तव्यापासून एक-दीड तासाच्या अंतरावर होते. आम्हाला बाली हाय क्रुझतर्फे  पिक अप आणि ड्रॉप होता.  दुपारी साडेतीन वाजता आम्ही निर्गमन करणार होतो त्यामुळे सकाळी आम्ही बरोबर आणलेले थेपले, दशम्या, बेसन वड्या, चिवडा, घारगे असे विविध पदार्थ खाऊन लाईट (?) लंच घेतले. बऱ्याच दिवसांनी पत्ते खेळलो, डॉब्लर्स नावाचा एक लहान मुलांचा पण अतिशय गमतीदार असा मानसिक तत्परता वाढविणारा  खेळही खेळलो. OLDAGE IS DOUBLE CHILDHOOD चाच जणू काही  अनुभव घेतला म्हणा ना!

बरोबर साडेतीन वाजता आमची सहा जणांची रंगीन टीम मस्त नटून थटून बेनोवा बंदरकडे जायला तयार झाली. आमची पिकअप कार आलेलीच होती. नेहमीप्रमाणेच गणवेशातला रुबाबदार हसतमुख पण नम्र ड्रायव्हर स्वागतास तयार होताच.

रस्त्यावरून जाताना प्रमोदच्या आणि ड्रायव्हरच्या नेहमीप्रमाणेच मस्त गप्पा चालू होत्या. भाषेचा अडसर कसाबसा पार करत गप्पा रंगल्या होत्या. तो सांगत होत, “इंडोनेशियामध्ये ८७% मुस्लिम आहेत पण बाली हे एकमेव असे बेट आहे की इथे ९०% हिंदू धर्मीय आहेत. हिंदू देवदेवतांची पूजा करणारे आहेत आणि हिंदू धर्माचा अभिमान बाळगणारे आहेत. घरोघरी हिंदू रिती परंपरा येथे पाळल्या जातात.”

अशा रितीने गप्पागोष्टी करत, फळाफुलांनी नटलेली वनश्री पहात, चौका-चौकातली शिल्पे आणि वास्तुकलेचे भव्य दर्शन घेत आम्ही बेनोवा बंदर वर पोहोचलो.  तिथले वातावरणच पर्यटन पूरक होते. सागर किनाऱ्यावर अनेक लहान-मोठी जहाजे नांगर टाकून उभी होती. आमच्यासारखेच अनेक उत्सुक  पर्यटक देशोदेशाहून  तिथे आलेले होते.अर्थात सारेच अत्यंत उत्साही आणि आनंदी मूडमध्ये  होते. आमची सनसेट डिनर क्रुझ संध्याकाळी  साडेपाचला सुटणार होती. जवळजवळ साडेतीन तासाची समुद्रसफर होती आणि डिनरसह संगीत, नृत्य असा भरगच्च कार्यक्रम बोटीवर असणार होता. तत्पूर्वी आम्हाला तिथे एक मधुर, शीतल स्वागत पेय देण्यात आलं. काउंटर वर आम्ही आमची तिकिटे घेतली प्रत्येकी ११ लाख इंडोनेशियन रुपये! जवळजवळ प्रत्येकी साडेसहा हजार भारतीय रुपये.  सर्व कारभार अतिशय शिस्तपूर्ण आणि नीटनेटका होता. सगळ्यांना सांभाळून बोटीपर्यंत नेले जात होते.  रुबाबदार वातावरण, सुसज्ज रेस्टॉरंट,सागराचं आणि आकाशाचं खुलं  दर्शन देणारा मस्त सुरक्षित डेक आणि सोबतीला हलकेच बालीनीज पारंपारिक वाद्य संगीत. एका वेगळ्याच वातावरणात गेल्याचा अनुभव आम्हाला मिळत होता.

ठीक साडेपाच वाजता बोटीने किनारा सोडला आणि त्या हिंदी महासागरातली ती अविस्मरणीय सफर सुरू झाली. निळे व्योम आणि आप या निसर्गतत्त्वांचा किती अनाकलनीय परिणाम मनावर होतो हे प्रत्यक्ष अनुभवत होतो. काही वर्षांपूर्वी आसाम मध्ये ब्रह्मपुत्रा नदीच्या दर्शनाने जी समाधीस्थ अवस्था काही क्षणापुरती का होईना पण जाणवली होती अगदी तशीच या सागर दर्शनाने पुनश्च जाणवत होती.” सागरा प्राण तळमळला.. सागरा…” अगदी नेमके हेच वाटत होते. खरं सांगू ?निसर्ग इतका अथांग, अफाट असतो की आपलं अस्तित्व त्याच्यासमोर फक्त कणभराचंच असल्यासारखं वाटतं! निसर्गासमोर सारं “मी पण” अहंकार, गर्व स्वतःविषयीच्या कल्पना, (गैर) सारं सारं काही क्षणात गळून पडतं.  मनाच्या खोल गाभाऱ्यात “कोहम” नाद घुमत राहतो.

आता माथ्यावरील निळ्या आकाशातले रंग बदलू लागले होते. बोट समुद्राच्या मध्यभागी आलेली होती. किनाऱ्यावरची घरे आणि हळूहळू पेटत चाललेले दूरचे दिवे हे सुद्धा खूप आकर्षक भासत होते.पश्चिम दिशेला ढळणार्‍या सूर्याने आकाशात केशरी, जांभळे रंग, उधळले होते मावळणाऱ्या सूर्यकिरणांतून पाण्यावर हलकेच तरंगणारे ते सोनेरी रंग पाहतांना कुसुमाग्रजांच्या कवितांच्या ओळी आठवल्या.

आवडतो मजला अफाट सागर

अथांग पाणी निळे

निळ्या जांभळ्या जळात केशर

सायंकाळी मिळे..

हवेतला  तो गुलाबी गारवा! स्तब्ध होत होतं सारं.. मन, डोळे जणूं अमृत प्राशन केल्यासारखे तृप्त होत होते. हलके हलके काळोखात बुडत चाललेला दिवस जणू काही उद्याचा नवा प्रकाश घेऊन येण्याचं आश्वासन देऊनच परतत होता. थोड्यावेळापूर्वीचा प्रकाशातला तो रोमँटिक निसर्ग कसा नि:शब्दपणे गूढ होत चालला होता.

ठीक साडेसात वाजता क्रुझ वर डिनर सुरू झाले. सोबत मस्त संगीत. आमच्याबरोबरचे युवक— युवतींचे मेळावे  अगदी धुंद, उत्तेजित झाले होते. आणि त्यांच्या समवेत त्यांना पाहताना नकळत आम्ही आमच्या गतकाळात जात होतो. कुठेतरी आजच्या आणि कालच्या काळाशी तुलनाही करत होतो. पण त्या क्षणी मात्र त्यांचं हे तारुण्य, जगणं, जीवन साजरं करणं पाहून निश्चितच हरखूनही गेलो होतो. त्यांचा प्रवास आमचा प्रवास निराळा होता. त्यांचं बाली पर्यटन आणि आमचं बाली पर्यटन यात खूप फरक होता. फरक ऊर्जेचा होता, मस्ती, भोगणं इतकच नव्हे तर खाण्यापिण्यातलाही होता. भरभरून जगणं आणि खूप काही जगून झाल्यानंतरच जगणं यातला फरक होता. समान फक्त एकच होतं. अनुभव. आनंदाचा, रिफ्रेश होण्याचा, रिक्रिएशनचा.

भरभरून खायला होतं. गरमागरम, आकर्षक आणि चविष्ट पदार्थांची रेलचेल होती.शौकीनांसाठी जलपानही होते. एकंदरच इंडोनेशियन जेवणाचा थाट औरच होता. उत्सुकतेपोटी आम्ही निरनिराळे पदार्थ चाखून पाहिले. काही आवडले, काही बेचव  वाटले. पण एकंदर अन्नसेवनाचा यज्ञ कर्म मजेत पार पडला.

त्यानंतर खास क्रुझ वरील सर्व पाहुण्यांसाठी  मनोरंजनाचा कार्यक्रम होता. अर्थातच संगीत आणि नृत्य. मुळातच बालीयन हे कलासक्तच आहेत. संगीत, नृत्य, नाट्य, अभिनय हे त्यांच्या धमन्यातूनच वाहत असावं.

बालीनीज नृत्य पाहण्याची आम्हालाही फार उत्सुकता होती.

बालीनीज  नृत्य हे लोक परंपरेचं प्रतीक आहे. शास्त्रोक्त पद्धतीची ती एक अतिशय मनोरम अशी नृत्यकला आहे. बालीनीज नृत्याच्या माध्यमातून नाट्यमयरीत्या हिंदू परंपरा, तसेच रामायण— महाभारतातील कथांची अतिशय मनोहारी मांडणी केली जाते. अनेक वाईट गोष्टींचे, विकारी वृत्तींचे (एव्हिल स्पिरिट्स) दमन हा विषय या नृत्याच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे सादर केला जातो. या संपूर्ण नृत्यात हस्त,पाद, मान, बोटे, डोळे यांच्या कलापूर्ण हालचालीतून प्रेक्षकांसमोर पौराणिक कथा उलगडत जाते.  चांगल्या गोष्टींचा वाईट गोष्टींवर, सत्याचा असत्यावर,  देववृत्तीचा असुर वृत्ती वर विजय कसा होतो याचं अत्यंत आकर्षक देहबोली आणि मुद्राभिनयातून केलेलं प्रकटीकरण पाहताना प्रेक्षक थक्क होतात.

या बालीनीज नृत्या मागे अनेक वर्षांचा इतिहासही आहे. पंधराव्या शतकापासून बालीनीजची सांस्कृतिक परंपरा काहीशी बदलू लागली आणि हिंदू धर्मीय एक प्रकारच्या या नृत्य कलेतून एकत्र यायला लागले, अधिक जोडले जाऊ लागले.

तसे या शास्त्रोक्त पारंपारिक नृत्याचे अनेक प्रकार आहेत बारोंग, फ्रॉग, जॉग, जेगॉग,लेंगोंग काकॅक वगैरे. आणि प्रत्येक नृत्य प्रकारची वैशिष्ट्ये निराळी आहेत. विषय निराळे आहेत, पोशाख वेगळे आहेत. आमच्यासमोर बोटीवर जे नृत्य सादर होत होते ते बारोंग प्रकारातले होते.यात राधाकृष्णाची प्रेमलीला होती.

पुरुष आणि स्त्रियांचा नृत्य करताना परिधान केलेला पोशाख ही आकर्षक होता. या पोशाखाचे दोन भाग असतात. वरचा व खालचा कमरेपासून पायापर्यंतचा. वरच्या भागाला सॅश म्हणतात व खालच्या भागाला केन म्हणतात. संपूर्ण पोशाखाला साबुक असे म्हणतात. आणि प्रामुख्याने कपड्याचा रंग सोनेरी असतो. डोक्यावर टोपेग नावाचा लाकडी कला कुसरीचा मोठा गोल मुकुट असतो. बाकी गळ्यात, हातात केसात, फुलांच्या,खड्यांच्या  माळा घातलेल्या असतातच. नाचताना त्यांच्या हातात कधी पंखे, कधी फुलांच्या कुंड्याही असतात. एकंदर हा डान्स अतिशय नयनरम्य असतो. हे नृत्य बघत असताना मला केरळमधील कथकली, मोहिनीअट्टम किंवा ओडिसी नृत्याची प्रामुख्याने आठवण झाली.  देशोदेशीच्या कला कुठेतरी समानतेच्या धाग्याने जोडलेल्या असतात हे नक्कीच.

तर मित्रांनो!अशा रितीने  चौफेर आनंदाचा अनुभव घेत आम्ही रात्री अकरा वाजता घरी परत आलो.आमच्या बाली सफरीचा हा समारोपाचा टप्पा होता.  दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजता आमची परतीची फ्लाईट होती.डेनसपार ते सिंगापूर ते मुंबई.

बाली बेटावरचा अविस्मरणीय आनंदाचा अनुभव घेऊन आता भारतात परतायचे होते. या आठ दिवसात इंडोनेशियातील बाली या निसर्गरम्य बेटाशी आमचं एक आनंददायी आणि भावनिक नातच जुळून आलं होतं.  इथला निसर्ग, हिंदी महासागराचे विहंगम नजारे, इथली संस्कृती,  परंपरा, कला आणि माणसं यांच्याशी एक रेशीम धागा नकळत जुळला गेला होता.

बाली हे जसं देवांचं बेट तसं बाली हे स्वप्नांचंही बेट आहे.  इथे प्रत्येकासाठी काहीतरी आहे. शांतता आणि विश्रांतीच्या शोधात आलेल्या पर्यटकांसाठी समुद्राच्या लाटा पाहणे, सूर्योदय, सूर्यास्त पाहणे, पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटणे हे सारं काही आहे. तरुणांसाठी इथे आनंददायी नाईट लाईफ आहे, आकर्षक मार्केट्स आहेत! हिरवीगार जंगले आहेत, कायाकिंग,सर्फरायडींग ,स्कुबा डायव्ह पॅरासेलिंग सारख्या साहसी सागरी क्रीडा आहेत. भौतिकता आणि आध्यात्मिकता यांची झालेली एक विलक्षण सरमिसळही इथे पाहायला मिळते.

आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावरची आमची ही बाली सहल आमच्यासाठी नक्कीच आनंदाची ओंजळ ठरली. वयाची आठवण ठेवूनही आम्ही या बेटावरचा प्रत्येक क्षण बेभानपणे जगलो मात्र. आणि जगणं हे किती आनंददायी आहे हा मंत्र घेऊन आणि आता पुढची सहल कुठे असे ठरवतच  भारतात परतलो. आमच्या विमानाने बालीची भूमी सोडली आणि उंच आकाशात झेप घेतली. पुन्हा एकदा वरून दिसणाऱ्या अथांग महासागराचे आणि गगनचुंबी गरुड विष्णूच्या शिल्पाचे निरोपाचे दर्शन घेतले आणि भारताच्या दिशेने .,”चला आता आपल्या घरी, आपल्या देशी” या भावनिक ओढीने आणि इतक्या दिवसांच्या मित्र—मैत्रीणीच्या,सहवासाच्या  विरहाची हुरहुर बाळगत परतीच्या प्रवासासाठीही आनंदाने  तयार झालो.

इथेच बाली सहलीची सफल संपूर्ण कहाणी समाप्त!

— समाप्त — 

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ “चला बालीला…” – भाग – ६ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “चला बालीला…” – भाग – ६ ☆ सौ राधिका भांडारकर 

— Fire Dance 

फायर डान्स —अग्नि नृत्य म्हणजे बाली बेटावरचे एक प्रमुख आकर्षण.

समुद्रकिनाऱ्यावर उतरत्या संध्याकाळी या नृत्याचे भव्य सादरीकरण असतं. बीचवर जाण्याच्या सुरुवात स्थानापर्यंत आम्हाला हॉटेलच्या शट्ल सर्विस ने सोडले.  उंच टेकडीवरून आम्हाला समुद्राचे भव्य दर्शन होत होते. ज्या किनाऱ्यावर हे अग्नी नृत्य होणार होते तिथपर्यंत पोहोचाण्याचा रस्ता बराच लांबचा, डोंगरावरून चढउताराचा, पायऱ्या पायऱ्यांचा होता.  सुरुवातीला कल्पना आली नाही पण जसजसे पुढे जात राहिलो तसतसे जाणवले की हे फारच अवघड काम आहे.  त्यापेक्षा आपण खालून किनाऱ्यावरून चालत का नाही गेलो? तो रस्ता जवळचा असतानाही— असा प्रश्न पडला. अर्थात त्याचे उत्तर यथावकाश आम्हाला मिळालेच. ती कहाणी मी तुम्हाला नंतर सांगेनच.  तूर्तास आम्ही धापा टाकत जिथे नृत्य होणार होते तिथे पोहोचलो.

बरोबर संध्याकाळी सहा वाजता हे अग्नी नृत्य सुरू झाले. चित्र विचित्र ,रंगी बेरंगी,चमचमणारी वस्त्रं ल्यायलेले, अर्धे अधिक उघडेच असलेले नर्तक आणि नर्तिकांनी हातात पेटते पलीते असलेली चक्रे फिरवून नृत्याला सुरुवात केली. समोर सादर होत असलेल्या त्या नृत्य क्रीडा, पदन्यास आणि ज्वालांशी लीलया चाललेले खेळ खरोखरच सुंदर तितकेच चित्तथरारक होते.  आपल्याकडच्या गोंधळ, जागर यासारखाच लोकनृत्याचा तो एक प्रकार होता. संगीताला ठेका होता. अनेक आदिवासी नृत्यंपैकी  हे एक नृत्य.साहस आणि कला यांचं अद्भुत मिश्रण होतं.

लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया

झळाळती कोटी ज्योती या….

या जुन्या गाण्याचीही आठवण झाली. 

काळोखात चाललेलं आभाळ, लाटांची गाज, मऊ शुभ्र वाळू यांच्या सानिध्यात चाललेलं ते अग्नी प्रकाशाचे नृत्य फारच प्रेक्षणीय होतं. उगाच  काहीसं भीषण आणि गूढही वाटत होतं.एक तास कसा उलटला ते कळलंही नाही.

परतताना मात्र आम्ही आल्यावाटेने गड चढत जाण्यापेक्षा सरळ वाळूतून चालत जायचे ठरवले. तिथल्या स्थानिक माणसाने आम्हाला एवढेच सांगितले,” अर्ध्या तासात समुद्राला भरती येईल. मात्र दहा ते पंधरा मिनिटात तुम्ही शटल पॉईंट ला पोहोचालच.  जा पण सांभाळून..” 

मग असे आम्ही सहा वृद्ध वाळूतून चालत निघालो.  वाळूतून चालणारे फक्त आम्हीच असू.बाकी सारे मात्र ज्या वाटेने आले त्याच वाटेने जाऊ लागले.

हळूहळू लक्षात आले वाळूच्या अनंत थरातून चालणे  सोपे नव्हते.  पाय वाळूत रुतत होते.  रुतणारे पाय काढून पुढची  पावले टाकण्यात भरपूर शक्ती खर्च होत होती. अंधार वाढत होता.समुद्र पुढे पुढे सरकत होता. आमच्या सहा पैकी सारेच मागे पुढे झाले होते. समुद्राच्या भरतीची वेळ येऊन ठेपत होती.

विलासला फूट ड्रॉप असल्यामुळे तो अजिबात चालूच शकत नव्हता.  आम्ही दोघं खूपच मागे राहिलो.  मी विलासला हिम्मत देत होते. थोड्या वरच्या भागात येण्याचा प्रयत्न करत होतो पण विलास एकही पाऊल उचलूच शकत नव्हता आणि तो वाळूत चक्क कोसळला. त्या विस्तीर्ण समुद्राच्या वाळूत, दाटलेल्या अंधारात आम्ही फक्त दोघेजण! आसपास कुणीही नाही. दोघांनाही आता जलसमाधी घ्यावी लागणार हेच भविष्य दिसत होतं. मी हाका मारत होते…” साधना, सतीश प्रमोद हेल्प हेल्प”

मी वाळूत उभी आणि विलास त्या थंडगार वाळूत त्राण हरवल्यासारखा निपचीत पडून. एक भावना चाटून गेली.

We have failed” आपण उंट नव्हतो ना…

कुठून तरी  साधना धडपडत कशीबशी आमच्याजवळ आली मात्र. सतीश ने माझी हाक ऐकली होती. समोरच बीच हाऊस मधून त्यांनी काही माणसांना आमच्यापर्यंत जाण्यास विनंती  केली.. दहा-बारा माणसं धावत आमच्या जवळ आली.  सतीशच्या प्रसंगावधानाचे कौतुक वाटले. कारण त्याने त्याच क्षणी जाणले होते की हे एक दोघांचं काम नव्हे. मदत लागणार.मग त्या माणसांनी कसेबसे विलासला उभे केले आणि ओढत उंचावरच्या पायऱ्या पर्यंत आणले. तिथून एका स्विमिंग बेड असलेल्या खुर्चीवर विलासला झोपवून पालखीत घालून आणल्यासारखे शटल पॉईंट पर्यंत नेले. हुश्श!!आता मात्र आम्ही सुरक्षित होतो. चढत जाणाऱ्या समुद्राला वंदन केले. त्याने त्याचा प्रवाह धरुन ठेवला होता का? त्या क्षणी ईश्वर नावाची शक्ती अस्तित्वात आहे याची जाणीव झाली.  आमच्या मदतीसाठी आलेली माणसं मला देवदूता सारखीच भासली. जगाच्या या अनोळखी टोकावर झालेल्या मानवता दर्शनाने आम्ही सारेच हरखून गेलो. श्रद्धा, भक्ती आणि प्रेम या संमिश्र भावनांच्या प्रवाहात मात्र वाहून गेलो. या प्रसंगाची जेव्हा आठवण येते तेव्हा एकच जाणवते, देअर इज नो शॉर्टकट इन  लाईफ

बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्ग सोडू  नको..हेच खरे.

शरीराने आणि मनाने खूप थकलो होतो गादीत पडताक्षणीच झोप लागली.

दुसऱ्या दिवशीची सकाळ छान प्रसन्न होती. विलास जरा नाराज होता कारण कालच्या थरारक एपीसोडमध्ये त्याचा मोबाईल मात्र हरवला.पण आदल्या दिवशी ज्या दुर्धर प्रसंगातून आम्ही दैव कृपेने सही सलामत सुटलो होतो,  त्या आठवणीतच राहून निराश, भयभीत न होता दुसऱ्या दिवशी आमची टीम पुन्हा ताजीतवानी  झाली. सारेच पुढच्या कार्यक्रमाचे बेत  आखू लागले.

आज सकाळी कर्मा कंदारा— विला नंबर ६७ च्या खाजगी तरण तलावावर जलतरण करण्याचा आनंद मनसोक्त लुटायचा हेच ठरवले.

अवतीभवती हिरव्या गच्चपर्णभाराचे वृक्ष आणि मधून मधून डोकावणारी  पिवळ्या चाफ्याची गोजीरवाणी झाडे यांच्या समवेत तरण तलावात पोहतानाचा आनंद अपरंपारच होता.

अनेक वर्षांनी इथे, बालीच्या या नयनरम्य पार्श्वभूमीवर, सुरुवातीला काहीशा खोल पाण्यात झेप घेताना भयही वाटलं.  पण नंतर वयातली ३०/४० वर्षं जणू काही आपोआपच वजा झाली आणि पोहण्याचा मनमुराद आनंद लुटू शकलो. झाडं, पाणी आणि सोबतीला आठवणीतल्या कविता. 

थोडं हसतो थोडं रुसतो 

प्रत्येक आठवण 

पुन्हा जागून बघतो ।।

 

अशीच मनोवस्था झाली होती. 

सिंधुसम हृदयात ज्यांच्या

रस सगळे आवळले हो

आपत्काली अन् दीनांवर

घन होउनी जे वळले हो

जीवन त्यांना कळले हो..

बा.भ. बोरकरांच्या या कवितेतले ‘जीवन कळणारे’ ते म्हणजे जणू काही आम्हीच होतो हीच भावना उराशी घेऊन आम्ही तरण तलावातून बाहेर आलो.

असे हे  बालीच्या सहलीत वेचलेले संध्यापर्वातले खूप आनंदाचे क्षण!!

तसा आजचा दिवस कष्टमय, भटकण्याचा नव्हता. जरा मुक्त,सैल होता. 

इथल्या स्थानिक लोकांशी गप्पा करण्यातली एक आगळी वेगळी मौज अनुभवली. 

ही गव्हाळ वर्णीय,, नकट्या नाकाची, गोबर्‍या गालांची, मध्यम उंचीची, गुगुटीत ईंडोनेशीयन  माणसं खूप सौजन्यशील, उबदार हसतमुख आणि आतिथ्यशीलही  आहेत.

भाषेचा प्रमुख अडसर होता.कुठलीही  भारतीय भाषा त्यांना अवगत असण्याचा प्रश्नच नव्हता. पण इंग्रजीही त्यांना फारसं कळत नव्हतं. ते त्यांच्याच भाषेत संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. पण गंमत सांगते,भाषेपेक्षाही मुद्राभिनयाने, हातवारे, ओठांच्या हालचालीवरूनही प्रभावी संवाद घडू शकतो याचा एक गमतीदार अनुभवच आम्ही घेतला.

सहज आठवलं ,पु.ल.  जेव्हा फ्रान्सला गेले होते तेव्हा दुधाच्या मागणीसाठी त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून कागदावर चक्क एका गाईचे चित्रच काढून दाखवलं होतं. तसाच काहीसा प्रकार आम्ही येथे अनुभवला. 

बाली भाषेतले काही शब्द शिकण्याचा खूप प्रयत्न केला पण लक्षात राहिला तो एकच शब्द सुसु.

बाली भाषेत दुधाला सुसू म्हणतात. 

पण त्यांनीही आपले ,’नमस्कार, शुभ प्रभात, कसके पकडो वगैरे आत्मसात केलेले शब्द, वाक्यं, त्यांच्या पद्धतीच्या उच्चारात बोलून दाखवले. माणसाने माणसाशी जोडण्याचा खरोखरच तो एक भावनिक क्षण होता!

या भाषांच्या देवघेवीत आमचा वेळ अत्यंत मजेत मात्र गेला आणि त्यांच्या प्रयत्नपूर्वक मोडक्या तोडक्या  इंग्लिश भाषेद्वारे बाली विषयी काही अधिक माहितीही मिळाली.

राजा केसरीवर्माने या बेटाचे नाव बाली असे ठेवले.

बाली या शब्दाचा अर्थ त्याग.

बाली या शब्दाचे मूळ, संस्कृत भाषेत आहे आणि या शब्दाचा सामर्थ्य, शक्ती हाही एक अर्थ आहे.आणि तो अधिक बरोबर वाटतो.

आणखी एक गमतीदार अर्थ त्यांनी असा सांगितला की बाली म्हणजे बाळ.  बालकाच्या सहवासात जसा स्वर्गीय आनंद मिळतो तसेच स्वर्गसुख या बाली बेटावर लाभते.

बाली बेटावरच्या स्वर्ग सुखाची कल्पना मात्र अजिबात अवास्तव नव्हतीा हे मात्र खरं!!

संध्याकाळी कर्मा ग्रुप तर्फे झिंबरान बीच रिसॉर्टवर आम्हाला कॉम्प्लिमेंटरी डिनर होते.जाण्या येण्यासाठी त्यांच्या गाड्या होत्या.

संगीत ,जलपान आणि गरमागरम पदार्थांची रेलचेल होती.वातावरणात प्रचंड मुक्तता होती. खाणे पिणे आणि संगीत ,सोबत तालबद्ध संगीतावर जमेल तसे केवळ नाचणे.  थोडक्यात वातावरणात फक्त आनंद आणि आनंदच होता आणि या आनंदाचे डोही आम्हीही अगदी आनंदे डुंबत  होतो.LIVE AND LET LIVE.

बाॅबी मॅक फेरीनच्या गाण्यातली ओळ ओठी आली..

 DONT WORRY BE HAPPY

OOH OH OH

– क्रमश: भाग सहावा 

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ “चला बालीला…” – भाग – ५ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “चला बालीला…” – भाग – ५ ☆ सौ राधिका भांडारकर 

चांडी सार पासून सानुर एक दीड तासावरच आहे.(by road)  बॅगा पॅक करून, भरपेट नाश्ता करून आम्ही निघालो. दोन निळ्या रंगाच्या स्वच्छ आणि आरामदायी टॅक्सीज आमच्यासाठी हजरच होत्या ऐटदार गणवेशातले हसतमुख ड्रायव्हर्स  आमच्यासाठी स्वागताला उभे  होते. दीड दोन तासातच आम्ही आमच्या कर्मा रॉयल सानुर रिसॉर्टला पोहोचलो.  पुन्हा एक सुंदर अद्ययावत सुविधांचा बंगला.  सभोवताली आल्हाददायी रोपवाटिका आणि जलतरण तलाव. इथे एक आवर्जून सांगावसं वाटतं की प्रत्येक शयनगृहात शयनमंचावर चाफ्याची फुले पसरलेली होती आणि हिरव्या पानांच्या कलात्मक रचनेत वेलकम असे लिहिले होते. मन छान गुलाबी होउन गेले हो!

वातावरणात काहीशी उष्णता आणि दमटपणा असला तरी थकवा मात्र जाणवत नव्हता. मन ताजे प्रफुल्लित होते. एका वेगळ्याच सुगंधी, मधुर आणि थंड पेयाने आमचे शीतल स्वागतही झाले. प्रत्येक टप्प्याटप्प्यावर आम्ही ८० च्या उंबरठ्यावरचे सहा जण नकळतच वय विसरत होतो हे मात्र खरे.

इथे आम्ही फक्त एकच दिवस थांबणार होतो.

संध्याकाळी जवळच असलेल्या सिंधू बीचवर जायचे आम्ही ठरवले. इथल्या अनेक दुकानांची नावे, समुद्रकिनार्‍यांची नावे, अगदी माणसांची विशेषनामेही  संस्कृत भाषेतील आहेत.  पुराणातल्या व्यक्तींची नावे आहेत.  जरी बालीनीज लिपीतल्या पाट्या वाचता येत नसल्या तरी इंग्लिश भाषांतरातील भगवान, कृष्णा, महादेव सिंधू अशी नावे कळत होती.नावात काय आहे आपण म्हणतो पण परदेशी गेल्यावर आपल्या भाषेतलं नाव आपुलकीचं नातं लगेच जोडतं.

संध्याकाळी बीचवर फिरायचे व तिथेच रेस्टॉरंट मध्ये स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायचा आम्ही ठरवले. हा समुद्रकिनारा काहीसा चौपाटी सदृश होता. पर्यटकांची गर्दी होती. फारशी स्वच्छता ही नव्हती. फेरीवाले, किनाऱ्यावरची दुकाने ,हॉटेल्स यामुळे या परिसरात गजबज आणि काहीसा व्यापारी स्पर्श होता.  पण बाली बेट हे खास सहल प्रेमींसाठीच असल्यामुळे वातावरणात मात्र मौज मजा आनंद होता.  तिथे चालताना मला पालघरच्या केळवा बीचची आठवण झाली. रोजच्या कमाईवर उदरनिर्वाह करणारी गरीब विक्रेती माणसं, यात अधिक तर स्त्रियाच होत्या.  इथे भाजलेली कणसे आणि शहाळी पिण्याचा काहीसा ग्रामीण आनंद आम्ही लुटला. पदार्थ ओळखीचे जरी असले तरी चावीमध्ये बदल का जाणवतो? इथले मीठ तिखट, आपले मीठ तिखट हे वेगळे असते का? की जमीन, पाणी, अक्षांश रेखांश या भौगोलिक घटकांचा परिणाम असतो? देशाटन करताना या अनुभवांची खरोखरच मजा येते.

इथल्या फेरीवाल्यांकडे आम्ही अगदी निराळीच कधी न पाहिलेली न खाल्लेली अशी स्थानिक फळे ही  चाखली. मॅंगो स्टीन नावाचे वरून लाल टरफल असलेले टणक फळ फारच रसाळ आणि मधुर होतं .फोडल्यावर आत मध्ये लसणाच्या पाकळ्यासारखे छोटे गर होते. काहीसं किचकट असलं तरी हे स्थानिक फळ आम्हाला खूपच आवडलं. 

बालीमध्ये भरपूर फळे मिळतात.  अननस, पपनस, पपया, फणस, आंबे पेरू या व्यतिरिक्त इथली दुरियन (काटेरी फणसासारखं पण लहान ), लाल रंगाचं केसाळ मधुर चवीचं राम्बुबुटन,टणक  टरफल फोडून आत काहीसा करकरीत सफरचंदासारखा गर असलेले सालक.. असा बालीचा  रानमेवा खाऊन आम्ही तृप्त झालो. 

 पाणी प्यावं बारा गावचं, चाखावा रानमेवा देशोदेशीचा—— असंच म्हणेन मी.

सी फुड साठी प्रसिद्ध असलेलं हे बाली बेट.  शाकाहारी लोकांसाठी भरपूर पर्याय असले तरी मासे प्रेमी लोकांसाठी मात्र येथे खासच मेजवानी असते असे म्हटले तर ते चुकीचे नाही.

समुद्रकिनाऱ्यावर आम्ही असे खात पीत भरपूर भटकलो. सहा म्हातारे तरुण तुर्क!  

आता आम्हाला  स्थानिक मासे खाण्याचा आनंद लुटायचा होता. मेरीनो नावाचे एक बालीयन रेस्टॉरंट आम्हाला आवडले.  किनाऱ्यावरचे सहा जणांचे टेबल आम्ही सुरक्षित केले. कसलीच घाई नव्हती. आरामशीर मासळी भोजनाचा आनंद लुटायचा हेच आमचे ध्येय होते. सारेच स्वप्नवत होते. समुद्राची गाज ,डोक्यावर ढगाळलेलं आकाश आणि टेबलावर मस्त तळलेले खमंग चमचमीत ग्रेव्हीतले मोठे झिंगे( प्राॅन्स) , टुना मासा आणि इथला प्रसिद्ध बारा मुंडी मासा. सोबतीला सुगंधी गरम आणि नरम वाफाळलेला भात आणि हो.. सोनेरी जलपानही. रसनेला आणखी काय हवे हो? गोड गोजीर्‍या बालीयन लेकी आम्हाला अगदी प्रेमाने वाढत होत्या! बाळपणीच्या, तरुणपणीच्या आठवणीत रमत आम्ही सारे तृप्तीचा ढेकर देत फस्त केले.  वृद्धत्वातही शैशवाला जपण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. नंतर पावसाच्या सरी बरसु लागल्या. भिजतच आम्ही मुख्य रस्त्यावर आलो आणि टॅक्सी करून रिसॉर्टवर परतलो. जेवणाचे बिल अडीच लाख आयडिआर, आणि टॅक्सीचे बिल तीस हजार आयडिआर. धडाधड नोटा मोजताना आम्हाला खूपच मजा वाटायची.

आता आमच्या सहलीचे तीनच दिवस उरलेले होते आणि या पुढच्या तीन दिवसाचा आमचा मुक्काम कर्मा कंदारा येथे होता. कंदारा मधली  कर्मा ग्रुपची ही प्रॉपर्टी केवळ रमणीय होती. निसर्ग, भूभागाची नैसर्गिक उंच सखलता, चढ-उतार जसेच्या तसे जपून इथे जवळजवळ ७० बंगले बांधलेले आहेत. आमचा ६७ नंबरचा बंगला फारच सुंदर होता.आरामदायी, सुरेख डेकाॅर, सुविधायुक्त, खाजगी जलतरण तलाव, खुल्या आकाशाखाली ध्यानाची केलेली व्यवस्था वगैरे सगळं मनाला प्रफुल्लित करणार होतं. रिसेप्शन काउंटर पासून आमचा बंगला काहीसा दूर होता. पण इकडून तिकडे जायला बग्या होत्या.  एकंदरीत इथली सेवेतली तत्परता अनुभवताना समाधान वाटत होते. बारीक डोळ्यांची गोबर्‍या गालांची, चपट्या नाकांची, ठेंगणी गुटगुटीत बाली माणसं आणि त्यांची कार्यक्षमता प्रशंसनीय होती. त्यांच्या बोलण्या वागण्यात एक प्रकारचा उबदारपणा होता.  वास्तविक फारसे उद्योगधंदे नसलेला हा प्रदेश. शेती, मच्छीमारी या व्यतिरिक्त पर्यटन हाच त्यांचा मुख्य व्यवसाय.  त्यांचे सारे जीवन हे देशोदेशाहून येणाऱ्या पर्यटकांवरच अवलंबून. त्यामुळे पर्यटकांना जास्तीत जास्त कसे खूश ठेवता येईल  यावरच त्यांचा भर असावा.

यानिमित्ताने दक्षिण पूर्व आशिया खंडातल्या इंडोनेशियाबद्दलही माहिती मिळत होती. इथल्या बाली  बेटावर आमचं सध्याचं वास्तव्य होतं. मात्र जकार्ता राजधानी असलेला  इंडोनेशिया म्हणजे जवळजवळ १७००० बेटांचा समूह हिंदी आणि पॅसिफिक महासागरात पसरलेला आहे. हिंदू आणि बुद्ध धर्माचे वर्चस्व असले तरी ८७ टक्के लोक मुस्लिम आहेत. जवळजवळ तीन शतके इथे डच्यांचे राज्य होते. १७ ऑगस्ट १९४५ साली नेदरलँड पासून ते स्वतंत्र झाले आणि प्रेसिडेन्शिअल युनिटरी स्टेट ऑफ द रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया म्हणून ओळखले जाऊ लागले जगातली तिसरी मोठी लोकशाही येथे आहे २००४  पासून जोकोविडो हे इंडोनेशियाचे अध्यक्ष आहेत. अनेक नैसर्गिक आपत्ती, भौगोलिक विषमता, जात, धर्म भाषेतील अनेकता सांभाळत इंडोनेशियाची इकॉनॉमी ही जगात सतराव्या नंबर वर आहे. 

इथल्या वास्तव्यातलं आमचं आजचं प्रमुख आकर्षण होतं ते म्हणजे बाली फायर डान्स . अग्नी नृत्य.  याविषयी आपण पुढच्या भागात वाचूया.

 – क्रमशः भाग पाचवा  

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मनोवेधक मेघालय…भाग – १० ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? मी प्रवासिनी ?

☆ मनोवेधक  मेघालय…भाग – १० ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

(षोडशी शिलॉन्ग)

प्रिय वाचकांनो,

आपल्याला लवून अखेरचा कुमनो! (मेघालयच्या खास खासी भाषेत नमस्कार, हॅलो!)

फी लॉन्ग कुमनो! (कसे आहात आपण?)

मंडळी, आपण मागील भागांत शिलॉन्गची सफर केली. पण सफर कुठलीही का असेना, शॉपिंग केल्याशिवाय ती पूर्णत्वाला येतच नाही. प्रत्येक ठिकाणी कांही ना कांही विशिष्ट वस्तू असतातच, त्यांचा शोध कुठे आणि कसा घ्यायचा याचे उपजत ज्ञान महिलावर्गाला असतेच असते. तेव्हां पुरुषमंडळींनी लांबलचक पायपीट करणे आणि ब्यागा उचलणे या गोष्टींची मानसिक आणि शारीरिक तयारी करून सिद्ध व्हावे!

शॉपिंग

डॉन बॉस्को संग्रहालयात एक दुकान आहे, तिथे मेघालयची स्मरणिका म्हणून बऱ्याच गोष्टी घेता येतील. बांबू अन वेताच्या वस्तू, स्वेटर, शाली आणि बरंच कांही असलेल्या या दुकानांत तुमच्या बजेट प्रमाणे तुम्ही वस्तू विकत घेऊ शकता! आम्ही इथे बरीच खरेदी केली. मात्र इथली मुख्य स्वस्त आणि मस्त अशी बाजारपेठ म्हणजे पोलिसबाजार! शहराच्या मधोमध असलेली ही जागा सतत गजबजलेली असते! फुटपाथवर असलेली बहुतेक दुकाने स्वयंसिध्दा स्त्रियाच चालवतात. अत्यंत सक्षम, आत्मविश्वासाने समृद्ध पण मृदुभाषी अशा या विविध वयाच्या स्त्रिया बघून मला खूप अप्रूप वाटले. मित्रांनो परत एकदा आठवण करून देते, या स्त्री सक्षमतेची दोन मुख्य कारणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य आणि साक्षरता! येथील मुलींना “चिंकी” म्हणून हिणवणाऱ्या लोकांनी इथे प्रत्यक्ष भेट द्यावी अन आत्मचिंतन करीत स्वतःलाच प्रश्न विचारावा की, प्रत्येक क्षेत्रात येथील स्त्रिया अव्वल का आहेत? इथे घासाघीस (बार्गेनिंग) करण्यास भरपूर वाव आहे, त्यामुळे महिलावर्गाला शॉपिंगचा मनमुराद आनंद उपभोगता येईल! शॉपिंग करून दमला असाल तर एक देखणे कॅफे आणि बेकरी आहे (Latte love cafe), तिथे  संगीत ऐकत निवांत बसा आणि क्षुधा शांत करा! आम्ही येथील पोलीस बाजारात बरीच खरेदी केली. कपडे, स्वेटर, शाली, वेताच्या वस्तू आणि बरेच काही!

आता मला आवडलेल्या मेघालय येथील दोन रेस्टॉरंटची माहिती देते. एक होते डॉकी ते सोहरा प्रवासात गावलेले. जेवण, नाश्ता इत्यादीकरता भरपूर चॉईस, शिवाय निसर्गरम्य अन स्वच्छ परिसर आणि अतिशय अदबीने वागणारा हॉटेल स्टाफ! रेस्टॉरंटचे नांव होते “Ka Bri War Resort”. दुसरे होते सोहरा (चेरापुंजी) येथील प्रसिद्ध रेस्टॉरंट, “Orange Roots”. हे पर्यटकांचे आवडते रेस्टॉरंट, इथे गर्दी नेहमीचीच, बाहेरच प्रवेशद्वाराजवळ एका काळ्या फळ्यावर लिहिलेला मेन्यू वाचायचा, अन ऑर्डर देऊनच आत शिरायचे. आपण कुठे बसतोय याची माहिती दारातील रिसेप्शनिस्टला दिली की झाले! आत सर्वत्र स्त्रियांचेच साम्राज्य, तुमच्यासमोर काही वेळातच स्वादिष्ट जेवण किंवा नाश्ता येणार. शिवाय प्रवेशद्वाराच्या बाहेर एक छोटे दुकान देखील आहे, विविध चवींचा चहा (पावडर व पत्ती), मसाले (मुखतः कलमी)आणि इतर वस्तू इथे मिळतात.

शिलॉन्ग येथील निवासी हॉटेल्स

आम्ही D Blanche Inn या शिलॉन्ग येथील हॉटेल मध्ये २ दिवस वास्तव्य केले. या टुमदार हॉटेलचा परिसर निसर्गरम्य होता. भोवताली हिरवाई अन निळे डोंगर, तसेच हॉटेलच्या आवारात सुंदर वृक्षवल्ली अन फुलझाडे बहरलेली होती. हॉटेल स्वच्छ अन सुख सुविधांनी परिपूर्ण होते. जेवण आणि नाश्ता उपलब्ध होते. दुसरे होते La Chumiere गेस्ट हाऊस, जुन्या काळचा, कुणा श्रीमंत व्यक्तीचा प्रशस्त दुमजली बंगला आता गेस्ट हाऊस मध्ये परिवर्तित करण्यात आलाय! बंगल्यातील खोल्या मोठ्या अन सुखसोयीयुक्त आहेत. बंगल्याचे संपूर्ण आवार हिरवाई अन विविध प्रकारच्या सुंदर आणि रंगीबेरंगी फुलांनी सुशोभित आहे. मी इथल्या बगीच्यात सकाळी रमतगमत चहा घेतला. बंगल्यातच ऑर्डर देऊन जेवण आणि नाश्ता उपलब्ध होता, दोन्ही अतिशय चविष्ट होते. आमच्या घरची मंडळी जेव्हा डेविड स्कॉट ट्रेल करता सकाळी ८ ते संध्याकाळी ५ पर्यंत बाहेर होती, तेव्हा मी या बंगल्यात निवांतपणे रिलॅक्स करीत होते.

खासी लोकांची खास खासी भाषा

मेघालयातील तीन जनजातींची खासी (Khasi), गारो (Garo), जैंतिया (Jaintia) अन इंग्रजी या सरकारमान्य भाषा आहेत. खासी भाषेविषयी आम्हाला सॅक्रेड फॉरेस्ट येथील गाईडने सांगितले की एका ख्रिश्चन धर्मगुरूने या भाषेकरिता इंग्रजी मुळाक्षरांचा वापर करून खासी भाषेकरता एक स्वतंत्र लिपी तयार केली (चित्र दिले आहे) यात २३ इंग्रजी मुळाक्षरे आहेत! आता खासी भाषेकरिता ही लिपी मेघालयात सर्वत्र (शाळा-कॉलेज मध्ये देखील) वापरली जाते. याशिवाय येथे इंग्रजीचा वापर प्रचलित आहे.

शिलॉन्ग विमानतळ

आमचे अंतिम डेस्टिनेशन शिलॉन्ग विमानतळ होते, अजयने आम्हाला विमानतळावर सोडले. तिथे एका कोपऱ्यात मेघालयची संस्कृती दर्शवणारी छोटीशी सुबक झोपडी बनवलेली होती तसेच बांबूच्या वस्तू ठेवल्या होत्या, खास फोटो काढण्यासाठी! आम्ही तिथे लगेच फोटो काढले. शिलॉंग ते कोलकोता अन तेथून मुंबई अशा २ विमानांचे आमचे आरक्षण होते. येथून इंडिगो एअरलाईन्सचे विमान दुपारी ४ वाजता सुटणार होते, मात्र ४.४५ वाजता कळले की दाट धुक्यामुळे हे विमान इथे येणार नाही, आम्ही विमनस्क आणि हताश होतो, तशातच इंडिगोच्या स्टाफने आम्हाला बोलावले व आम्ही तुमच्यासाठी गुवाहाटी ते दिल्ली किंवा कोलकोता अन पुढे मुंबई अशी २ विमानांत तुमच्या प्रवासाची सोय करू असे सांगितले. आम्ही तडक त्यांच्या सूचना पाळीत त्यांच्याच कॅबने गुवाहाटी विमानतळावर गेलो (सुमारे ३ तासात ११० किलोमीटर) अन अखेर गुवाहाटी ते दिल्ली अन दिल्ली ते मुंबई असे, रात्री १० ला पोचायचे ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ ला घरी पोचलो. आमची गैरसोय नक्कीच झाली, मात्र मी इंडिगो एअर लाईन्सच्या स्टाफचे आभार मानते, त्यांनी अत्यंत तत्परतेने स्वतः होऊन आमचा हा सर्व प्रवास निःशुल्क उपलब्ध करून दिला. आम्ही गुवाहाटी ते मुंबई हा सरळ विमानप्रवास करावयास पाहिजे होता असे नंतर वाटले. मात्र शेवटी आमची ही देखील यात्रा सफल आणि संपूर्ण झाली अन ११ दिवसांनी होम स्वीट होम या रीतीने मी पुनश्च एकदा माझ्याच घराच्या प्रेमात (बेडवर) पडले!

आम्ही मेघालयचा थोडाच (बहुतांश उत्तरेकडील) भाग पाहिला, पण संपूर्ण समरस होऊन! याचे बहुतेक श्रेय माझा जावई उज्ज्वल (बॅनर्जी) आणि माझी नात अनुभूती यांच्या नियोजनाला तसेच माझी मुलगी आरती हिला देईन. यात होम स्टे व गेस्टहाऊस ने खूप मजा आणली, तसेच उपलब्ध वेळात चांगले स्पॉट्स बघितलेत. जातांना मी द्विधा मनस्थितीत होते की, मला हा प्रवास झेपेल किंवा नाही, पण या तिघांनी मला खूप सांभाळून घेतलं, मी तर म्हणेन अगदी पावला-पावलाला, अन म्हणूनच मेघालय मला इतके पावले अन भावले. अर्थात आपल्या इतक्या जवळच्या व्यक्तींचे आभार कसे मानायचे म्हणून आपण बहुदा ते करत नाही, पण मी मात्र ते अगदी मनापासून मानते, किंबहुना ते मनाच्या आतल्या हळव्या कोपऱ्यातूनच आलेले आहेत!!!

मंडळी, मेघालयच्या ११ दिवसांच्या प्रवासाचे वर्णन इतके लांबेल आणि त्याचे १० भाग लिहीन असे मला कल्पनेत सुद्धा वाटले नव्हते, मात्र आता या प्रवासाला विराम देण्याची वेळ आली आहे!

पुढील प्रवासवर्णनाचा योग येईल तेव्हा येईल!

खासी, गारो और जैंतिया जनजातियों का फ्यूजन नृत्य

What A Wonder #Meghalaya | Meghalaya Tourism Official

तोपर्यंत सध्यातरी शेवटचे खुबलेई! (khublei) म्हणजेच खास खासी भाषेत धन्यवाद!)

प्रिय मैत्रांनो, माझ्या मेघालय प्रवासाच्या मालिकेचे सर्व भाग तुमच्यापर्यंत पोचवणाऱ्या ‘ई अभिव्यक्ती:मराठी’ चे प्रमुख संपादक श्री हेमंत बावनकर आणि त्यांच्या टीमला मनःपूर्वक धन्यवाद देते!

*लेखात दिलेली माहिती लेखिकेचे अनुभव आणि इंटरनेट वर उपलब्ध माहिती यांच्यावर आधारित आहे. इथले फोटो (काही अपवाद वगळून) व्यक्तिगत आहेत!

* या संपूर्ण सादरीकरणात समाविष्ट केलेली चित्रे व गाण्याची लिंक केवळ अभ्यासापुरतीच मर्यादित आहेत.

– समाप्त –

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ “चला बालीला…” – भाग – ४ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “चला बालीला…” – भाग – ४ ☆ सौ राधिका भांडारकर 

आमच्या रिसॉर्टला लागूनच समुद्रकिनारा असल्यामुळे आम्ही सकाळी समुद्रावरच फेरफटका मारला. ढगाळ वातावरणामुळे सूर्योदयाचा आनंद मात्र मनासारखा घेता आला नाही.  पण एकंदर सारे सुखद होते.

एक मच्छीमार त्याची छोटीशी नाव समुद्रात ढकलून काहीसा आत जाऊन मासेमारी करत होता. थोड्यावेळाने तो परतला आणि त्याच्या जाळ्यात अडकलेली मासळी तो सोडवू लागला.  किनाऱ्यावर बोट खेचली, तिला उलटी करून त्यातले पाणी रेती उपसले.  पसरलेल्या जाळ्यांची नीट घडी घालून सारे आवरले आणि पकडलेल्या मासळीची थैली घेऊन तो परतला.  संपूर्ण भिजला होता. कमरेला आपल्या कोळ्यांसारखेच घट्ट वस्त्र आणि डोक्यावर आडवी टोकदार टोपी.  एकटाच मन लावून काम करत होता.  कदाचित मिळालेल्या मासळीवरच त्याची आजच्या दिवसाची उपजीविका असेल.  पण तो त्रासलेला, थकलेला वाटला नाही.  कर्तव्यनिष्ठ, जीवनाला सामोरा जाणारा धीट दर्यावर्दीच भासला.  पुन्हा एकदा वाटलं, देश कोणताही असू दे, माणूस भले रंगा रूपाने वेगळा असू दे, पण माणूस हा माणूसच असतो. भाव भावनांचं, जगण्याचं एकच रसायन.  प्रवासामध्ये असे वैचारिक दृष्टिकोन आपोआपच विस्तृत होत जातात.वसुधैव कुटुंबकम*याचा अर्थ कळतो.  एक सांगायचं राहिलंच!  त्या मच्छीमाराच्या टोपलीतले ताजे मासे पाहून आम्हा सगळ्यांनाच त्याच्याकडून एक तरी फ्रेश कॅच घ्यावा आणि मस्त भारतीय पद्धतीने तेलावर परतून खावा असे वाटले.  आम्हाला पाकखाना  व्यवस्था होती.  मात्र तेल, मीठ, तिखट आणावे लागले असते आणि त्यासाठी पुन्हा काही हजार आयडिआर लागले असते! म्हणून ती खमंग, चमचमीत कल्पना नाईलाजाने आम्ही सोडूनच दिली.

बाली इंडोनेशियन बेटावर मुक्तपणे हिंडताना जाणवत होता तो इथला  नयनरम्य निसर्ग !रम्य समुद्रकिनारे. पारंपारिक संस्कृती, सर्जनशीलता, कला, हस्तकला आणि इथल्या स्थानिक लोकांचा अस्सल उबदारपणा. बाली बेटावर फिरत असताना वेगळेपणा जाणवत असला तरी आपण भारतापासून दूर आहोत असे मात्र वाटत नाही. आंबा, केळी, नारळाची झाडे आपल्याला कोकण केरळची आठवण करून देतात.  हिरवीगार भाताची पसरलेली शेतं,  त्यावर अलगद पडलेले सूर्यकिरण आणि वातावरणात दरवळलेला आंबेमोहोराचा सुगंध हा अनुभव केवळ वर्णनातीत. डिसेंबर महिन्यातही आंब्याच्या झुबक्यांनी लगडलेले आम्रवृक्ष पाहताना मन आनंदित होते, थक्क होते.  रस्त्यावर जिकडे तिकडे बहरलेले गुलमोहर भारतातल्या चैत्र वैशाखाची आठवण करून देतात. टवटवीत विविध रंगाच्या बोगन वेली, पांढऱ्या आणि पिवळ्या चाफ्यांनी पानोपानी  बहरलेली झाडं  कॅमेरातली मेमरी संपवतात.  इथली जास्वंदी, एक्झोरा, झेंडू जणू काही  आपल्याशी संवाद साधतात.

“तुम्ही आणि आम्ही एकच आहोत” अशी भावना निर्माण करतात.

रस्त्याच्या कडेला असलेली दुकाने, फळवाले, खाद्यपदार्थांच्या गाड्या पाहताना तर वाटते हे सारं अगदी आपल्या देशातल्या सारखंच आहे.

रस्ते आखीव आणि रुंद असले तरी वाहनांची वर्दळ जाणवते. मात्र एक जाणवतं ते या वर्दळीला असलेली शिस्त.  अजिबात घाई नाही. नियम मोडण्याची वृत्ती नाही, हॉर्नचा कलकलाट, नाही सिग्नलचे इशारे काटेकोरपणे पाळणारा हा ट्रॅफिक मात्र अमेरिकन वाटतो.  चुकारपणे मनात येते हे इंडोनेशियन लोक मुंबई पुण्यात गाडी चालवू शकतील का?

इथली टप्पे असलेली लाल कौलारू घरे लक्षवेधीच आहेत. या घरांची बांधणी काहीशी चिनी, नेपाळी, हिमाचल प्रदेशीय वाटते.  हिंदू मंदिरे जशी आहेत तसेच इथे बौद्धविहारही आहेत. भिंतीवरची रंगीबेरंगी तिबेटियन कलाकारी आणि वास्तुकला इथे पहायला मिळतेच पण वैविध्य व निराळेपण जाणवतं ते चौकाचौकातली  हिंदू पुराणातल्या व्यक्तींची भव्य शिल्पे पाहताना. संगीत आणि नृत्यकलेसाठी हे बेट प्रसिद्ध आहे हे  इथल्या नृत्यांगना, वाद्यं यांची शिल्पं अधोरेखित करतात.  ही रस्त्यावरची शिल्पं अतिशय काळजीपूर्वक सांभाळलेली आहेत. कुठेही धूळ नाही, रंग उडालेले नाहीत.  बालीत हिंडताना नेत्रांना दिसणारा हा नजारा फारच सुखद वाटतो.

शहरीकरण आणि परंपरा यांची सुरेख सरमिसळ इथे आहे. कोकोमार्ट, अल्फा मार्ट सारखी सुपर मार्केट्स, ब्रँडेड दुकाने एकीकडे तर पारंपारिक कला, संस्कृती हिंदू धर्माचे वर्चस्व दाखवणारी मंदिरे आणि विहार, तसेच सर्वत्र पसरलेला अथांग सागर आणि झाडीझुडपातला निसर्ग एकीकडे.  मानवनिर्मित आणि निसर्ग यांची झालेली दोस्ती एक सुंदर संदेश देते.. विकास करा निसर्ग जपा 

चांडीसार मधला आजचा आमचा शेवटचा दिवस होता. दुसऱ्या दिवशी आम्ही सानुरला जाणार होतो.  तत्पूर्वी आमच्या रिसॉर्ट तर्फे समुद्रकिनारी असलेल्या रेस्टॉरंट मध्ये कर्मा सदस्यांना बार्बेक्यू आणि वाईन डिनर होतं. तरुण आणि ज्येष्ठ पर्यटकांसाठी ही एक मनोरंजक भेट(treat) होती. गंमत म्हणजे इथे रात्रीचे भोजनही संध्याकाळी पाच पासूनच सुरू होते आणि आठला संपते.  त्यामुळे आम्ही सकाळचे लंच घेतलेच नाही. या कॉम्प्लिमेंटरी डिनरचा आस्वादच पूर्णपणे घ्यायचा ठरवला आणि तो घेतलाही. समुद्राची गाज, सोबत बालीनियन लोक संगीत.. हेही काहीसे भारतीय संगीताच्या जवळपासचे आणि गरमागरम तंदुरी व्हेज नॉनव्हेज पदार्थ आणि सोबत रेड वाईनचा प्याला.  वाचकहो!  गैरसमज करून घेऊ नका पण अशा वातावरणात जीवन जगण्याचा हलका आणि चौफेर आनंद का घेऊ नये?”थोडासा झूम लो..”

आमच्याबरोबर आमच्यासारखेच सारे तरुण, म्हातारे पर्यटक मस्त रंगीन पणे या सहलीची मौज लुटत होते, वय विसरत होते  हे मात्र नक्की.

 – क्रमशः भाग चौथा 

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मनोवेधक मेघालय…भाग – ९ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? मी प्रवासिनी ?

☆ मनोवेधक  मेघालय…भाग – ९ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

(षोडशी शिलॉन्ग)

प्रिय वाचकांनो,

आपल्याला दर वेळी प्रमाणे आजही लवून कुमनो! (मेघालयच्या खास खासी भाषेत नमस्कार, हॅलो!)

फी लॉन्ग कुमनो! (कसे आहात आपण?)

मंडळी, मागील वेळेस आपण शिलॉन्गची सफर करायला सुरुवात केली. आता शिलॉन्गमधील अजून कांही नयनरम्य स्थळांना भेट देऊ या. चला तर मग भरपूर चालायची तयारी करून! 

एलिफेंट धबधबा (Elephant falls)

शिलॉन्गच्या उत्तर भागातील एक अन्य सर्वांगसुंदर असे ठिकाण म्हणजे पर्यटकांनी बघितलेच पाहिजे असे एलिफेंट धबधबा (एलिफेंट फॉल्स)! या जलप्रपाताला खेटून हत्तीच्या आकारासारखा एक विस्तीर्ण खडक होता, म्हणून ब्रिटिशांनी याचे नांव एलिफेंट फॉल्स असे ठेवले. मात्र आता या निर्झराजवळील तो कुंजरासम भलामोठा खडक नाही, कारण तो १८९७ मधील भूकंपात नष्ट झाला. मात्र या निर्झराचे बारसे ज्या नांवाने झालय तेच नांव आजही प्रचलित आहे! शहराच्या मध्यापासून ११ किलोमीटर अंतरावर असलेला हा त्रिस्तरीय धबधबा (हा धबधबा तीन टप्प्यांमध्ये पडतो) बघायला वर्षाऋतूत जावे, फेसाळणाऱ्या शत शत दुग्ध धारांच्या लयबद्ध सप्तसुरांनी अवघा परिसर निनादून टाकणाऱ्या या निर्झराचे प्राकृतिक रमणीय दर्शन अतिशय मोहून टाकणारे. एकदा बघितल्यावर दृष्टी खिळवून टाकणारे. पावसाळ्यात जात असाल तर पायऱ्यांची उतरण काळजीपूर्वक सांभाळून एक स्तर बघा, डोळ्यात साठवा, खाली उतरा, दुसरा स्तर बघा, परत खाली पायऱ्यांची उतरंड अन सर्वात खोल असा तिसरा स्तर पाण्याच्या प्रवाहात प्रवाहित होतांना बघा. सर्वात खाली या मनोहरी अन रमणीय नीलजलप्रपाताचे एकत्रित जल एका छोट्याशा तलावात साठते. तलावाभोवती हिरवी वनराई सतत सोबत असतेच! मित्रांनो, पुढचे कार्य त्रासदायक, कारण आता पायऱ्या चढायच्या आहेत! केवळ निर्झराचं दर्शन नव्हे तर त्याला अनायास कवेत घेणाऱ्या सदाहरित हिरवाईचे बाहुपाश आहेतच! खळाळणारा हा जलप्रपात अन त्याला लगटून सोबतीला हिरवेगार डोंगर! हे नेत्रदीपक अन ‘पिक्चर परफेक्ट’ दृश्य नेत्रात अन कॅमेऱ्यात कैद करून ठेवा! असे हे अभूतपूर्व दृश्य बघण्यासाठी शिलॉन्गमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात यात नवल ते काय!

डॉन बॉस्को संग्रहालय (Don Bosco Museum)

हे संग्रहालय शिलॉन्ग शहराच्या मध्यबिंदू पासून ५ किलोमीटर अंतरावर सेक्रेड हार्ट चर्चच्या आवारात आहे. कलासक्त, इतिहास प्रेमी, नाविन्याची वाट चोखाळणाऱ्या, मेघालयच्या संस्कृतीविषयी जाणून घेण्यास उत्सुक असणाऱ्या अशा सर्व प्रकारच्या आबालवृद्ध पर्यटकांचे या वास्तूत प्रेमाने स्वागत होते. आरंभीच एक पथदर्शक आपल्याला या संग्रहालयाच्या ७ मजल्यात स्थित विविध दालनांची थोडक्यात माहिती देतो. मात्र बाहेर उभे राहून या भव्य-दिव्य संग्रहालयाची पुसटशी कल्पना देखील येत नाही. या विशाल ७ मजली इमारतीत सतरा वेगवेगळ्या नयनरम्य गॅलरी आहेत! त्यांत काय नाही ते विचारा! कलाभवन (आर्ट गॅलरी), हस्तकला, कलावस्तू, पोशाख, दागिने आणि ईशान्य भारतातील विविध जमातींनी वापरलेली शस्त्रे यांचा विस्तृत संग्रह इथे खच्चून भरलेला आहे. संपूर्ण ईशान्य भारताच्या विहंगम दृश्यांची पर्वणी एकाच ठिकाणी साधून देणारे दर्शनीय असे हे संग्रहालय!

इथे इतके काही बघण्यासारखे असल्याने पर्यटकांचे संपूर्ण समाधान होणे जरा कठीणच! हे सर्व बघण्याकरता एक दिवस देखील कमी पडणार! किती म्हणून नजरेत साठवावे अन फोटो तरी किती काढावेत! “काही बघायचे राहून गेले”, अशी प्रत्येक मजल्यावर आपली अवस्था होते. म्हणूनच आपल्याकडे वेळ कमी असल्यास, पत्रकात बघून आपल्याला आवडतील ते मजले चोखंदळपणे निवडावेत अन ते समाधान होईपर्यंत शांतपणे बघावेत. मी माझ्या आवडीनुसार आर्ट गॅलरीत मनसोक्त रमले! या इमारतीचा सर्वात उत्कंठावर्धक बिंदू अर्थात सर्वात वरचा मजला, “स्काय वॉक”. आम्ही गेलो तेव्हा नुकताच पाऊस पडल्याने मार्ग जरा निसरडा होता, गोल घुमटाभोवती फिरत शिलॉन्गचे मनमोहक दर्शन घ्यायचे, इथे हा चरम मनोज्ञ अनुभव घ्यायलाच हवा, काय बघायचे ते त्या त्या पॉईंट वर लिहिले आहेच, शिवाय फोटो काढणे आलेच, पण सेल्फी काढतांना जपून बरं का मंडळी! चौथ्या मजल्यावर एक छानसे कॅफे आहे! याच्याच बाजूला ईशान्य भारताचं बहारदार दर्शन घडवणारी चित्रफीत एका छोट्या चित्रपट थिएटर मध्ये दाखवल्या जाते, ती आवर्जून बघावी अशीच आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर, हे भव्य दिव्य संग्रहालय ईशान्य भारताची सांस्कृतिक संपन्नता सांगणारे रेखीव चित्र-दालनच समजा ना!              

कॅथेड्रल ऑफ मेरी हेल्प ऑफ ख्रिश्चनस

शिलॉन्ग येथील हे चर्च कॅथोलिक आर्कडिओसीसचे कॅथेड्रल चर्च आणि शिलॉन्गच्या मेट्रोपॉलिटन आर्चबिशपचे आसन म्हणून प्रसिद्ध आहे. शहराच्या मध्यबिंदू पासून केवळ २ किलोमीटर दूर असलेलं हे चर्च पर्यटकांचे अत्यंत आवडते ठिकाण आहे. सुमारे ५० वर्षांपूर्वी हे बांधलेले कॅथेड्रल शिलॉन्ग आर्कडिओसेसच्या साडेतीन लाखांहून अधिक कॅथलिक लोकांचे मुख्य प्रार्थनास्थळ आहे. त्यात पूर्व खासी हिल्स आणि री-भोई जिल्ह्यांचा समावेश आहे (एकंदर ३५ चर्च). हे चर्च Laitumkhrah या भागात आहे. या चर्चचे नांव येशूच्या Mary the mother यांच्यावरून दिलेले आहे, मदर मेरीच्या पुतळ्यासह ही पांढरी शुभ्र संगमरवरी इमारत अति भव्य आणि शोभिवंत दिसते. या चर्चची खासियत म्हणजे उंच कमानी आणि सुंदर रंगांनी सुशोभित काचेच्या खिडक्या! कॅथेड्रलच्या आत, क्रॉसची काही सुंदर टेराकोटा स्टेशन्स आहेत, जी येशूच्या जीवनातील घटना दर्शवतात. या भागात प्रामुख्याने येशू ख्रिस्ताच्या यातना व मृत्यूविषयक चित्रांचे दर्शन होते, ही चित्रे जर्मनी येथील एका कला संस्थेने तयार केली आहेत. या सोबतच येथे पवित्र शास्त्र आणि संतांच्या जीवनातील दृश्ये चित्रित केली आहेत. फ्रान्स येथे १९४७ ला तयार केलेली अप्रतिम रंगीत तावदाने हे या चर्चचे आणखी एक वैशिष्ट्य! मुख्य वेदीसमोर डावीकडे शिलॉन्गचे पहिले मुख्य बिशप ह्युबर्ट डी’रोसारियो, यांची कबर आहे. कबरीच्या पुढे अन मेरी आणि बाल येशूच्या पुतळ्यासमोर आणखी एक वेदी आहे. येथील पवित्र वातावरणात कांही वेळ शांतपणे बसावेसे वाटते! इथे दर महिन्याला नऊ दिवस विशेष भक्ती केली जाते. एका टेकडीवर उंचावर असलेल्या, त्याच टेकडीवर कोरलेल्या आणि कॅथेड्रलच्या अगदी खाली स्थित असलेल्या ग्रोटो चर्चला देखील आपण भेट देऊ शकतो.

वॉर्ड्’स लेक (Ward’s Lake)

हा सुंदर मानवनिर्मित तलाव शहराच्या मध्यभागी राजभवनजवळच स्थित आहे. “अवती भवती रम्य उपवने” असल्याने या तलावाचा परिसर सदैव लहान मोठ्या माणसांनी फुललेला असतो. इथले एक आकर्षण म्हणजे स्वचलित वल्हवणाऱ्या विविध आकाराच्या नौका. पायांनी आरामात नियंत्रित करणाऱ्या या बोटीतून तलावात विहार करावा, सोबतच हिरव्यागार वृक्षवेली अन पुष्पवाटिकांचे दर्शन घेत घेत नौकानयन करावे. तलावाच्यावर  पार्क आणि बोटॅनिकल गार्डन यांना जोडणारा पूल आहे, त्याखालून नौका पुढे घ्यावी. या तलावात बगळ्यांची माळफुले तरंगत असतात, नौका जवळ आली की ती विखुरतात. सांजवेळी नौकानयन बंद झाल्यावरच संपूर्ण तलावात त्यांचा स्वच्छंद विहार सुरु होतो! एकंदरीत, माणसांवर कुणीही प्राणी अथवा पक्षी विश्वास ठेवत नाहीत हेच खरे! नौकानयनाचा आनंद लुटल्यावर येथील तलावाभोवती असलेल्या उपवनातील पायवाटांवर मस्त फेरफटका मारा किंवा नुसतेच रिलॅक्स करायला देखील मजा येईल. निसर्गरम्य वातावरण आणि कमालीची स्वच्छता, याकरता हा पार्क आवर्जून बघावा असाच आहे!

थंगराज गार्डन

हे विशाल उपवन पण फार नयनरम्य आहे. विविध वृक्षराजींनी अन फुलांच्या ताटव्यांनी बहरलेले हे निसर्ग शोभेने सजलेले ठिकाण खरोखरी बघण्यासारखे आहे. आत शिरताच काय बघावे याचे मार्गदर्शन करणारा फलक दिसतो. गार्डनमध्ये फिरतांना त्या त्या ठिकाणच्या वृक्षवेलींची माहिती देणारे फलक जागोजागी दिसतात. उपवनाला वेढा घालणाऱ्या पायवाटा अन त्यांचे कुंपण, खाली नजर टाकली की शिलॉन्गचे विहंगम रूप दिसते. पायऱ्या चढल्या की विविध रंगांची वृक्षराजी दृष्टीस पडते. इथे फोटो काढण्याकरता बरीच सिनेमास्कोप ठिकाणे आहेत, आत काचेच्या घरात एक सुंदर नर्सरी (ग्रीनहाऊस) आहे!

Shillong city |Capital of Meghalaya | Informative Video

 

PYNNEH LA RITI || by kheinkor composed by apkyrmenskhem

प्रिय मैत्रांनो, आपण शिलॉन्गची अद्भुत सफर अगदी रमतगमत केली. अजून कांही सांगायचे शिल्लक राहिले आहेच. ते आपण पुढील अर्थात अंतिम भागात जाणून घेऊ! आत्तापुरता विराम देते!

खुबलेई! (khublei) म्हणजेच खास खासी भाषेत धन्यवाद!)

टीप-

*लेखात दिलेली माहिती लेखिकेचे अनुभव आणि इंटरनेट वर उपलब्ध माहिती यांच्यावर आधारित आहे. इथले फोटो (कांही अपवाद वगळून) व्यक्तिगत आहेत!

© डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares