मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक 35 – भाग 4 – ट्युलिप्सचे ताटवे – श्रीनगरचे ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 35 – भाग 4 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ ट्युलिप्सचे ताटवे – श्रीनगरचे  ✈️

टंगमर्गवरून आम्ही गुलमर्ग इथे गेलो. पायथ्याशीच थंडीचे कोट व बूट भाड्याने घेतले. गोंडेला राइड ( केबल कार राइड ) जिथून सुरू होते त्याच्या दीड किलोमीटर आधी आपल्या गाड्या थांबतात. तिथून बर्फावरील स्लेजने, स्थानिक सहाय्यकांच्या मदतीने गोंडेला स्टेशनवर पोहोचता येते किंवा बर्फ बाजूला केलेल्या चांगल्या रस्त्यावरून थोडासा चढ चढून चालत जाता येते. आम्ही रमतगमत चालण्याचे ठरवले. प्रवाशांचे जत्थे कुणी चालत तर कुणी स्लेजवरून गोंडेला स्टेशनला जात होते .प्रवाशांना ओढत नेणाऱ्या स्लेज गाड्यांची उजवीकडील बर्फातील रांग आणि डावीकडील अर्धी बर्फात बुडलेली घरे पाहत गोंडेला स्टेशनवर पोहोचलो. खूप मोठी रांग होती. चार- चार प्रवाशांना घेऊन गोंडेला (केबल कार्स ) जात होत्या. त्यात धावत्या गाडीत बसल्याप्रमाणे पटकन बसल्यावर दरवाजे बंद झाले. खालीवर, सभोवती पांढरे शुभ्र बर्फच बर्फ. काही धाडसी ट्रेकर्स ती वाट चढून जाताना दिसत होते. त्यांच्या गुडघ्यापर्यंत आत गेलेल्या बुटांच्या खुणा गोंडेलातून स्पष्ट दिसत होत्या. बर्फात बुडालेली मेंढपाळ गुराखी या गुजर जमातीची घरे रिकामी होती. हे लोक बर्फ वितळेपर्यंत गुरे, शेळ्यामेंढ्यांसह खाली सपाटीवर येऊन राहतात व नंतर परत आपल्या घरी येतात. पश्मिना या एका विशिष्ट जातीच्या मेंढ्यांच्या लोकरीच्या पश्मिना शाली हलक्या, उबदार असतात. महाग असल्या तरी त्यांची नजाकत और असते.

गोंडेलाने पहिल्या टप्प्यापर्यंत म्हणजे कॉंगडोरीपर्यंत गेलो. त्यापुढचा अफरबटचा टप्पा इथून धुक्यात हरवल्यासारखा दिसत होता. पण हौशी, धाडसी प्रवासी तिथेही जात होते. पहिल्या टप्प्यावर उतरून तिथे बांधलेल्या लाकडी कठड्यांवर निस्तब्ध बसून राहिले. नगाधिराज हिमालयाचं दर्शन म्हणजे विराटाचा साक्षात्कार! ते भव्य- दिव्य, विशाल, थक्क करणारं अद्भुत दर्शन आज युगानुयुगे तिथे उभे आहे.  अभेद्य कवचकुंडलासारखे आपले संरक्षण करीत चिरंजीवित्वाने ताठ उभे आहे. अशावेळी वाटतं की, आपण असणं आणि नसणं ही फार फार क्षुल्लक गोष्ट आहे. हे सनातन, चिरंतन वैभव आहे म्हणून आपल्या अस्तित्वाला किंचित अर्थ आहे.

थोड्याच दिवसात तिथे स्कीईंग कॉम्पिटिशन सुरू होणार होत्या. त्यात भाग घेणारी तरुणाई तिथे उत्साहाने प्रॅक्टिस करीत होती. हौशी प्रवासी स्कीईंगची मजा घेण्यासाठी तिथल्या लोकांच्या सहाय्याने धडपडत होते. आम्ही स्लेजची राइड घेतली. छोट्याशा लाकडी चाकवाल्या फळकुटावरून, मागेपुढे मदतनीस घेऊन बर्फाच्या गालीच्यावरून थोडे चढून गेलो आणि त्यांच्याच मदतीने घसरत परतलो.  आल्यावर गरम- गरम छान कॉफी प्यायल्यावर थोडे उबदार वाटले. गरम चहा, कॉफी, भेळ, सँडविच सारा नाश्ता अगदी तयार होता.स्वित्झर्लंडला जुंगफ्रा येथे लिफ्टने वर जाऊन बर्फात जायच्या आधी गरम- गरम टोमॅटो सूप घेतले होते तेव्हा त्या व्यवस्थेचे कौतुक वाटले होते. तेही आता उरले नाही. ‘हम भी कुछ कम नही’ हे सप्रमाण सिद्ध  झाले.

जम्मू ते श्रीनगर या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाची जोरदार उभारणी सुरू आहे. अतिशय अवघड आणि आव्हानात्मक असलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पाचे बरेचसे काम झाले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर काश्मीर खोऱ्याच्या गरजा द्रुतगतीने पूर्ण होतील आणि पर्यटनातही चांगली वाढ होईल.

असे सतत जाणवत होते की सर्वसामान्य काश्मिरी माणसाला असे तणावपूर्ण आयुष्य नको आहे. गरिबी आणि अज्ञान यामुळे त्यांच्यापुढील  मार्ग बदलले आहेत. अजूनही तरुणांची दिशाभूल करून त्यांना  दहशतवादाच्या मार्गाला लावले जाते. राजकीय परिस्थितीमुळे या देवभूमीतून ज्यांना विस्थापित व्हावे लागले त्यांचे दुःख फार मोठे आहे. या भूप्रदेशाची कथा आणि व्यथा खूप वेगळी आहे. त्यामुळे  सामाजिक, सांस्कृतीक, राजकीय अशा अनेक समस्या इथे ठाण मांडून उभ्या आहेत. आपले ‘सख्खे शेजारी’ हर प्रयत्नांनी ही परिस्थिती अशीच ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना मदत करणारे ‘विषारी ड्रॅगन’ त्यात भर घालतात.  दहशतवादाची काळी सावली आज साऱ्या जगावर पसरली आहे.

वैष्णोदेवी, कारगिल, लेह- लडाख, अमरनाथ, काश्मीरचे खोरे अशा अनंत हातांनी हिमालय आपल्याला साद घालीत असतो. आपल्या आवडीप्रमाणे, सवडीप्रमाणे या हाकेला आपण प्रतिसाद दिलाच पाहिजे. शांततापूर्ण सौंदर्याची, समृद्धीची बहुरंगी ट्युलिप्स इथे बहरतील अशी आशा करुया.

भाग ४ आणि श्रीनगर समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक 34 – भाग 3 – ट्युलिप्सचे ताटवे – श्रीनगरचे ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 34 – भाग 3 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ट्युलिप्सचे ताटवे – श्रीनगरचे ✈️

अमरनाथला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी पहलगाम इथे खूप मोठी छावणी उभारलेली आहे. यात्रेकरूंची वाहने इथपर्यंत येतात व मुक्काम करून छोट्या गाड्यांनी चंदनवाडीपर्यंत जातात. तिथून पुढे अतिशय खडतर, एकेरी वाटेने श्रावण पौर्णिमेच्या यात्रेसाठी लक्षावधी भाविक सश्रद्ध अंतकरणाने पदयात्रा करतात. हिमालयाच्या गूढरम्य पर्वतरांगांमध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लय या आदिशक्तींची अनेक श्रध्दास्थाने आपल्या प्रज्ञावंत पूर्वजांनी फार दूरदृष्टीने उभारलेली आहेत.(चार धाम यात्रा, अमरनाथ, हेमकुंड वगैरे ). हे अनाघ्रात सौंदर्य, ही निसर्गाची अद्भुत शक्ती सर्वसामान्य जनांनी पहावी आणि यातच लपलेले देवत्व अनुभवावे असा त्यांचा उद्देश असेल का? श्रद्धायुक्त पण निर्भय अंतःकरणाने, मिलिटरीच्या मदतीने, अनेक उदार दात्यांच्या भोजन- निवासाचा लाभ घेऊन वर्षानुवर्षे ही वाट भाविक चालत असतात.

सकाळी उठल्यावर पहलगामच्या हॉटेलच्या काचेच्या खिडकीतून बर्फाच्छादित हिमशिखरांचे दर्शन झाले. नुकत्याच उगवलेल्या सूर्यकिरणांनी ती शिखरे सोन्यासारखी चमचमत होती. पहलगाम येथील अरु व्हॅली, बेताब व्हॅली, चंदनवाडी, बैसरन म्हणजे चिरंजीवी सौंदर्याचा निस्तब्ध, शांत, देखणा आविष्कार! बर्फाच्छादित पर्वतरांगांमधील सुरू, पाईन, देवदार, फर, चिनार असे सूचीपर्ण, प्रचंड घेरांचे वृक्ष गारठवणाऱ्या थंडीत, बर्फात आपला हिरवा पर्णपिसारा सांभाळून तपस्वी ऋषींप्रमाणे शेकडो वर्षे ताठ उभी आहेत. दाट जंगले,  कोसळणारे, थंडगार पांढरे शुभ्र धबधबे आणि उतारावर येऊन थबकलेले बर्फाचे प्रवाह. या देवभूमीतले  सौंदर्य हे केवळ मनाने अनुभवण्याचे आनंदनिधान आहे.

पहलगामला एका छोट्या बागेत ममलेश्वराचे (शंकराचे) छोटे देवालय आहे. परिसर बर्फाच्छादित शिखरांनी वेढलेला होता. शंकराची पिंडी नवीन केली असावी. त्यापुढील नंदी हा दोन तोंडे असलेला होता. आम्ही साधारण १९८० च्या सुमारास काश्मीरला प्रथम आलो होतो. त्या वेळेचे काश्मीर आणि आजचे काश्मीर यात जमीन- अस्मानाचा फरक जाणवला. सर्वत्र शांतता होती पण ही शांतता निवांत नव्हती. खूप काही हरवल्याचं, गमावल्याचं  दुःख अबोलपणे व्यक्त करणारी, अविश्वास दर्शविणारी ,  संगिनींच्या धाकातली, अबोलपणे काही सांगू बघणारी ही कोंदटलेली उदास  शांतता होती.

श्रीनगर भाग ३ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक 33 – भाग 2 – ट्युलिप्सचे ताटवे – श्रीनगरचे ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 33 – भाग 2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ट्युलिप्सचे ताटवे – श्रीनगरचे ✈️

वेरीनाग इथल्या निर्झरातून झेलमचा उगम होतो. ‘श्री’ च्या आकारात वाहणाऱ्या झेलमच्या दोन्ही तीरांवर श्रीनगर वसले आहे. श्रीनगरमध्ये फिरताना सफरचंद आणि अक्रोड यांचे पर्णहीन वृक्ष दिसत होते.  बदाम, जरदाळू यांची एकही पान नसलेली सुंदर मऊ पांढऱ्या मोतीया आणि गुलाबी रंगाच्या फुलांनी डवरलेली झाडे दिसत होती. लांबवर पसरलेली मोहरीची शेतं हळदी रंगाच्या फुलांनी डोलत होती तर अजून फुलं न आलेली शेतं काळपट हिरव्या रंगाची होती. थंडी खूपच होती.पायघोळ झग्याआड पोटाशी शेगडी घेऊन जाणारे स्त्री- पुरुष दिसत होते. सर्वत्र तणावपूर्ण शांतता जाणवत होती. रस्तोरस्ती लष्कराची वाहने आणि बंदूकधारी जवान मनातल्या अस्वस्थतेत भर घालीत होती. दुकानांमध्ये कलिंगडे, संत्री, केळी, कमलकाकडी, इतर भाज्या दिसत होत्या. कहावा किंवा कावा या काश्मिरी स्पेशल चहाची दुकाने जागोजागी होती. अस्सल काश्मिरी केशराच्या चार काड्या आणि दालचिनीच्या तुकडा असं उकळत ठेवायचं. त्यात साखर घालायची. एका कपाला एक सोललेला बदाम जाडसर कुटून घालायचा आणि त्यावर केशर दालचिनीचे उकळते मिश्रण ओतायचं. झाला कहावा तयार!

गाईडने दिलेल्या या माहितीमुळे ‘कावा’ पिण्याची इच्छा झाली पण बस मध्येच थांबविणे अशक्य होते.

जहांगीरच्या काळात साधारण चारशे वर्षांपूर्वी निशात बाग, शालीमार बाग, व चष्मेशाही अशा सुंदर बागा बांधण्यात आल्या. तळहाताएवढ्या सुगंधी गुलाबाच्या फुलांचा हंगाम अजून सुरू झाला नव्हता, पण वृक्षांसारखे झाड बुंधे असलेली गुलाबाची झाड लालसर पानांनी बहरून फुलण्याचा तयारीत होती. उंचावरून झऱ्यासारखे वाहणारे पाणी पायऱ्या- पायऱ्यांवरून घरंगळत होते. मध्येच कमळाच्या आकारातली दगडी कारंजी होती. सगळीकडे दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणावर चालू होती.

चष्मेशाहीमध्ये मागच्या पीर- पांजाल पर्वतश्रेणीतून आलेले झऱ्याचे शुद्ध पाणी आरोग्यदायी असल्याचे सांगण्यात आले. डेरेदार काळपट- हिरव्या वृक्षांना चोचीच्या आकाराची पांढरी फुले लटकली होती. ती नासपतीची झाडे होती.  हिरवा पर्णसंभार असलेली मॅग्नेलियाची (एक प्रकारचा मोठा सुगंधी चाफा ) झाडे फुलण्याच्या तयारीत होती. निशात बागेजवळ ‘हजरत बाल श्राइन’ आहे. हजरत मोहमद साहेबांचा ‘पवित्र बाल’ इथे ठेवण्यात आला आहे. मशीद भव्य आणि इस्लामिक स्थापत्यकलेचा नमुना आहे.मशिदीच्या आत स्त्रियांना प्रवेश नव्हता. मागील बाजूने थोडा पडदा किलकिला करून स्टेनगनधारी पहारेकर्‍याने ‘पवित्र बाल’ ठेवलेल्या ठिकाणाचे ‘दूरदर्शन’ घडविले. स्वच्छ आवारात चिनारची झाडं होती. दल सरोवराच्या पश्चिमेकडील काठावर असलेल्या या मशिदीची पुनर्बांधणी करण्यात आली आहे.

श्रीनगरपासून तीन किलोमीटरवर पांडेथ्रान गाव आहे आणि साधारण १४ किलोमीटरवर परिहासपूर नावाचं गाव आहे. या दोन्ही ठिकाणी राजा ललितादित्याच्या कारकिर्दीत म्हणजे आठव्या शतकात उभारलेल्या बौद्ध स्तूपांचे अवशेष आहेत. अनंतनागपासून चार-पाच किलोमीटरवर मार्तंड देवालयांचा समूह आहे.  डावीकडचे कोणे एकेकाळी भव्य दिव्य असलेल्या सूर्यमंदिराचे भग्नावशेष  संगिनींच्या पहाऱ्यात सांभाळले आहेत.

पहेलगामच्या रस्त्यावर खळाळत अवखळ वाहणारी लिडार नदी आपली सतत सोबत करते. नदीपात्रातील खडक, गोल गुळगुळी दगड यावरून तिचा प्रवाह दौडत असतो. गाईड सांगत होता की मे महिन्यात पर्वत शिखरांवरील बर्फ वितळले की नदी तुडुंब पाण्याने उसळत वेगाने जाते. त्यावेळी तिच्यावरील राफ्टिंगचा थरार अनुभवण्यासाठी अनेक देशी-विदेशी प्रवासी येतात. तसेच नदीपलीकडील पर्वतराजीत ट्रेकिंगसाठी अनेक प्रवासी येतात. त्याशिवाय घोडदौड, ट्राउट माशांची मासेमारी अशी आकर्षणे आहेत. हिमालयाच्या पार्श्वभूमीवर पोपटी हिरवळीवर वर्ल्डक्लास गोल्फ कोर्टस आहेत. त्यासाठीही हौशी खेळाडू येतात.

पहलगाम रस्त्यावर प्राचीन काळापासून केशराच्या शेतीसाठी प्रसिद्ध असलेलं पांपूर( पूर्वीचं नाव पद्मपूर ) लागतं. साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात जमिनीलगत उगवलेल्या जांभळ्या सहा पाकळ्यांच्या फुलांनी शेतेच्या शेते बहरतात. या फुलांमधील सहा केसरांपैकी केसरिया रंगाचे तीन केसर हे अस्सल केशर असतं. उरलेले तीन हळदी रंगाचे केसर वेगळ्या पद्धतीने वापरले जातात.

श्रीनगर भाग २ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक 32 – भाग 1 – ट्युलिप्सचे ताटवे – श्रीनगरचे ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 32 – भाग 1 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ ट्युलिप्सचे ताटवे – श्रीनगरचे ✈️

समोर नगाधिराज हिमालयाची झबरबन पर्वतराजी, मागे तीन बाजूच्या निळसर हिरवट पर्वतरांगांच्या कोंदणात  नीलपाचूसारखा चमकणारा दल सरोवराचा विस्तीर्ण जलाशय आणि यामध्ये पसरलेलं ट्युलिप्सच्या अनेकानेक रंगांचं लांबवर पसरलेलं स्वर्गीय  इंद्रधनुष्य! अवाक होऊन आम्ही ते अलौकिक दृश्य नजरेत साठवत होतो. रक्तवर्णी, हळदी, शुभ्र मोत्यासारखी, गुलाबी, जांभळी, सोनपिवळ्या रंगावर केशरकाडी लावल्यासारखी कमळकळ्यांसारखी ट्युलिप्सची असंख्य फुलंच फुलं! साक्षात विधात्याने विणलेला अस्सल काश्मिरी गालिचा पुढ्यात पसरला होता. त्यांच्या मंदमधूर मोहक सुगंधाने वातावरण भारून टाकलं होतं

कुणाच्या कल्पनेतून, प्रयत्नातून साकार झालं असेल हे अनुपम सौंदर्य? या प्रकल्पाविषयी जाणून घेण्यासाठी काश्मीर गव्हर्मेंटचे डिस्ट्रिक्ट फ्लोरिकल्चर ऑफिसर डॉक्टर जावेद अहमद शाह यांची मुद्दाम भेट घेतली. इथे ट्युलिप्स फुलविण्याच्या कल्पनेला सरकारचा सक्रिय पाठिंबा मिळाला. दल सरोवरासमोरील हिमालयाच्या झबरबन टेकड्यांच्या उतरणीवर थोडं सपाटीकरण करून मोठ्या गादीसारखे वाफे तयार करण्यात आले. ॲमस्टरडॅमहून ट्युलिप्सचे फक्त कंद आयात करण्यात आले. बाकी सारी मेहनत, तंत्रज्ञान हे इथल्या फ्लोरिकल्चर डिपार्टमेंटचे योगदान आहे.

एकूण ७० एकर जागेवर ही फुलशेती करण्यात येते. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात ट्युलिप्सच्या कंदांची लागवड करण्यात येते. साधारण डिसेंबरच्या उत्तरार्धापासून जानेवारी संपेपर्यंत साऱ्या श्रीनगरवर बर्फाची चादर पसरलेली असते. लागवड केलेला हा संपूर्ण भूभाग बर्फाने अच्छादलेला असतो .जमिनीच्या पोटातले कंद लहान शाळकरी मुलांसारखे महिनाभर तो भला मोठा बर्फाचा गोळा चोखत बसलेले असतात. साधारण फेब्रुवारीत बर्फ  वितळतं आणि कंदांच्या बालमुठीला हिरवे लसलशीत कोंब फुटतात. त्यांची मशागत करावी लागते. शेळ्या- मेंढ्या, गाई, खेचरं यांचं शेणखत ठराविक प्रमाणात घालतात. तसंच जंतुनाशकं, रसायनिक खतं यांचाही मोठ्या प्रमाणात वापर करतात. मार्च अखेर रोपांची वाढ पूर्ण होते.निरनिराळ्या प्रजातीप्रमाणे ही रोपं दीड ते अडीच फूट उंच वाढतात आणि मग बहरतात. या रंगपऱ्यांचं आयुष्य किती? तर तीन ते चार आठवडे! साधारण मार्चअखेर ते एप्रिलअखेर एक महिना हा सारा बहर असतो. अवेळी पाऊस पडला तर तीन आठवड्यातच त्यांच्या पाकळ्या गळून पडतात.

बहर संपल्यावर एक महिना ती झाडं तशीच ठेवतात. जून महिन्यात जमिनीतले कंद नेटकेपणे अलगद काढलेले जातात. ते जपून ठेवण्यासाठी वेगळी यंत्रणा उभारण्यात आली आहे. साधारण १७ ते २३ सेंटीग्रेड उष्णतेत निर्जंतुक करून त्या कंदांना सांभाळण्यात येतं. जरुरीप्रमाणे काही नवीन जातीचे, रंगांचे कंद ॲमस्टरडॅमहून आणण्यात येतात. ऑक्टोबरपर्यंत सारं नीट सांभाळत, जमिनीची मशागत करून पुन्हा नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये लागवड केली जाते. भारतीय व परदेशी प्रवासी आवर्जून हा अलौकिक नजारा पाहायला गर्दी करतात.

विस्तीर्ण दल सरोवरातून शिकारा सहल करताना शंकराचार्य टेकडीवरील मंदिर, हरी पर्वताची रांग दिसते. सरोवरामध्ये झाडांचं वाळकं गवत, वेली व माती यांचा एकमेकांवर थर बसून इथे अनेक छोटी बेटं तयार झाली आहेत. त्यावर तरंगती घरं, मीना बाजार आहे. पाणथळ जागेतील लहान- मोठ्या झाडांवरून गरुड, खंड्या, बुलबुल यांनी दर्शन दिलं. चार शाळकरी मुली होडीत दप्तरं ठेवून स्वतःच ती  छोटी होडी वल्हवत दल सरोवराकाठी असलेल्या त्यांच्या गावाकडे जात होत्या. चौकशी केल्यावर कळलं की त्यांना रोज एक तास जायला आणि एक तास यायला  वल्हवावं लागतं तेव्हा त्या श्रीनगरच्या शाळेत पोहोचतात.

श्रीनगरहून पहेलगामला जाताना दुतर्फा चिनार आणि सफेदा यांचे प्रचंड घेरांचे वृक्ष दिसत होते.  चिनारच्या वठल्यासारख्या वाटणाऱ्या पोकळ, प्रचंड घेरांच्या बुंध्यातून चिनारची हाताच्या पंजासारखी पान असलेली कोवळी पालवी लवलवत होती. सफेदा वृक्षांच्या फांद्या घरांच्या उतरत्या छपरांसाठी वापरल्या जातात. विलो, देवदार, फर असे अनेक प्रकारचे वृक्ष होते. विलोच्या झाडांपासून क्रिकेटच्या बॅट बनविल्या जातात.

आठव्या शतकातील ललितादित्य या राजाच्या कालखंडात इथे मंदिर वास्तुकला बहरली होती. त्यानंतरच्या अवंतीवर्मन आणि जयसिंह यांनी ही मंदिर वास्तुकला वैभवसंपन्न केली. राजा जयसिंह याच्या काळात राजकवी कल्हण याने आपल्या ‘राजतरंगिणी’ या दीर्घ काव्यग्रंथात काश्मीरमधील शिल्पवैभवाने नटलेल्या अनेक देवालय समूहांचं सुंदर वर्णन केलेले आहे. ब्रिटिश संशोधक सर ऑरेट स्टेन यांनीही आपल्या संशोधनामध्ये या मंदिरशिल्पांवर प्रकाश टाकला आहे. श्रीनगर- सोनमर्ग रस्त्यावर कनकिनी नदीच्या तीरावरील नारंग येथे भव्य देवालयांचा शिल्पसमूह ग्रानाईटच्या लांबट- चौकोनी दगडांमध्ये इंटरलॉक पद्धतीने बांधलेला होता. त्याच्या अखंड काळ्या दगडातून कोरलेल्या घुमटाचं वर्णन ‘राजतरंगिणी’मध्ये केलेलं आहे. तिथल्या नैसर्गिक नितळ झर्‍यांचं, त्यातील माशांचं वर्णनही त्यात आहे. सम्राट अशोकाचा पुत्र जालुका याने २००० वर्षांपूर्वी बांधलेलं शिव-भूतेश देवालय याचा उल्लेखही ‘राजतरंगिणी’ मध्ये आहे. आज त्याचे काही भग्न अवशेष शिल्लक आहेत.

श्रीनगर भाग १ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक 31 – भाग 4 – कलासंपन्न ओडिशा ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 31 – भाग 4 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ कलासंपन्न ओडिशा ✈️

पुरीपासून ५० किलोमीटर अंतरावर ‘सातापाडा’ नावाचं ठिकाण आहे. तिथून चिल्का सरोवराला फेरफटका मारण्यासाठी जाता येतं. चिल्का सरोवराची लांबी ६५ किलोमीटर असून त्याचं क्षेत्रफळ ७८० चौरस किलोमीटर आहे. चिल्का सरोवराच्या ईशान्य भागात दया व भार्गवी या नद्या येऊन मिळतात. हे खाऱ्या पाण्याचं विशाल सरोवर आहे.  समुद्राच पाणी ज्या ठिकाणाहून सरोवरात येतं ते समुद्रमुख बघण्यासाठी मोटार लाँचने दोन तासांचा प्रवास करावा लागतो. सरोवरातील डॉल्फिन दिसतात. हे सरोवर जैव विविधतेने समृद्ध आहे. इथे जवळजवळ २०० प्रजातींचे हजारो स्थलांतरित पक्षी येतात.

संबलपूरहून १६ किलोमीटर अंतरावर महानदीवरील हिराकूड धरण आहे. महानदीचं पूर नियंत्रण, वीज निर्मिती, शेतीसाठी पाणी या उद्देशाने हे मोठं धरण बांधण्यात आलं आहे. पाणी अडविल्यामुळे इथे निर्माण झालेला प्रचंड मोठा तलाव हा आशियातील सर्वात मोठा तलाव समजला जातो.

संबलपुरी नृत्य व संबलपुरी साड्या प्रसिद्ध आहेत. राउरकेला इथला स्टील  प्लॅ॑ट हे ओडिशाचं आधुनिक वैभव आहे. नंदनकानन इथल्या प्राणी संग्रहालयात पांढरे वाघ बघायला मिळतात. इथे मगरींचे प्रजनन सेंटरही आहे.

ओडिशामध्ये मिळणारे ताज्या मासळीचे विविध प्रकार प्रवाशांना आवडतात. मैद्याच्या पारीमध्ये खोबरं व ड्रायफ्रूट्स घालून बनविलेल्या चौकोनी आकाराच्या, वर लवंग टोचलेल्या लवंग लतिका चविष्ट लागतात. दूध नासवून त्या घट्ट चौथ्यापासून जिलबी बनविली जाते. त्याला ‘छेना पोडा’ असं म्हणतात.

पुरीपासून जवळ भुवनेश्वर रस्त्यावर पिपली नावाचं गाव आहे. या गावात कापडाचे आणि आरशाचे तुकडे शिवून खूप सुंदर तोरणं, कंदील, पिशव्या, ड्रेसची कापडं बनविली जातात. त्याला ‘चंदोवा’ कला म्हणतात. अनेक  पर्यटकांची पावले खरेदीसाठी या गावाकडे वळतात. ही कला आता जगप्रसिद्ध झाली आहे.

पुरीहून साधारण दहा किलोमीटरवर रघुराजपूर आहे. या गावातली प्रत्येक व्यक्ती कलावंत आहे. इथल्या सर्व घरांच्या बाह्यभागावर सुबक नक्षी कोरलेली असते. उत्तम शिल्पकार, चित्रकार, लाकडावर नक्षी करणारे कारागीर, रंगकाम करणारे आणि ओडिशाचे वैशिष्ट्य असलेली ‘पट्टचित्र’ या खास कलेत पारंगत असलेले अनेक कलाकार इथे आहेत. साबुदाणा भिजवून त्याची खळ कापडाला लावून त्यावर रामायण, महाभारत आणि जगन्नाथ (श्रीकृष्ण ) यातील प्रसंगांवर चित्रं काढली जातात. त्यासाठी फक्त नैसर्गिक रंग वापरतात. हिंगुळ या नावाचा एक दगड असतो. त्याची पावडर करून लाल रंग मिळवितात. निळ्या रंगासाठी काही स्फटिक आणून ते दळून त्याची पावडर केली जाते. हळद, समुद्रफेस, खडूची भुकटी, काजळ, चिंचेचा डिंक अशांसारख्या वस्तू पट्टचित्र कलेमध्ये वापरल्या जातात. डॉ. जगन्नाथ महापात्रा यांनी ‘जात्रीपाटी’ ही शैली विकसित केली आहे. पट्टचित्राचं काम बरंचस या शैलीप्रमाणे केलं जातं. ओडिशा सरकारने या गावाला ‘ऐतिहासिक वारसा ग्राम’ असा विशेष दर्जा दिलेला आहे. बरेच परदेशी कलाकार ही कला शिकण्यासाठी इथे येतात.

ओडिसी शास्त्रीय नृत्यकलेला दोन हजारांहून अधिक वर्षांची परंपरा आहे. इसवीसन पूर्व २०० मध्ये लिहिलेल्या भरत मुनींच्या नाट्यशास्त्रात ओडिशी नृत्यकलेबद्दल लिहिलं आहे. ओरिया कविराज जयदेव यांचं ‘गीत गोविंद’ हे काव्य प्रसिद्ध आहे. कलिंग राजा खारवेल याने संगीत व नृत्यकलेला राजाश्रय दिला. आदिवासी लोकगीतं तसंच शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीताची परंपरा ओडिशामध्ये आहे. सुप्रसिद्ध नर्तक केलुचरण महापात्र यांचं जन्मगाव रघुराजपूर आहे. संयुक्ता पाणिग्रही, सुजाता मोहपात्रा, रतिकांत मोहपात्रा यांनी गुरुवर्य केलुचरण यांची परंपरा पुढे चालविली आहे.

मनोज दास, मोनालिसा जेना, कुंतला कुमारी असे अनेक प्रसिद्ध साहित्यिक ओडिशाला लाभले.न्यूयॉर्कला राहणाऱ्या आणि खूप वेगळ्या विषयांवर चित्रपट बनविणाऱ्या मीरा नायर या मूळच्या राउरकेलाच्या. ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या डॉक्टर प्रतिभा राय या साहित्यातील अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत. तरुण शास्त्रीय संगीत गायिका, स्निती मिश्रा ही मूळची ओडिशाची आहे.

महानदीच्या उदंड प्रवाहातील ओडिशाची अनेक अंगानी बहरलेली कलासंपन्न सांस्कृतिक परंपरा अखंडित आहे

भाग ४ व ओडिशा समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक 30 – भाग 3 – कलासंपन्न ओडिशा ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 30 – भाग 3 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ कलासंपन्न ओडिशा ✈️

महानदीच्या तीरावर वसलेलं ‘कटक’ हे शहर पूर्वी ओडिशाच्या राजधानीचं शहर होतं. तेराव्या शतकात बांधलेला इथला बाराबतीचा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून जिंकून घेतला होता. इसवी सन १८०३ पर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. आता हा किल्ला बराचसा उध्वस्त झाला आहे. मात्र त्याचं पूर्वीचं प्रवेशद्वार अजून शाबूत आहे. हे अवशेष चांगल्या रीतीने जपले आहेत. किल्ल्याजवळ बांधलेलं भव्य  बाराबती स्टेडिअम कसोटी क्रिकेट सामन्यांसाठी प्रसिद्ध आहे.

कोणार्क येथील सूर्यमंदिर म्हणजे उडिया शिल्पकाव्याची अक्षयधारा आहे. भुवनेश्वरहून ६२ किलोमीटर अंतरावर असलेलं हे सूर्यमंदिर कलिंग शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.  कोणार्क मंदिर दीर्घ काळ रेतीत बुडालेलं होतं. १८९३ मध्ये ते प्रथम उकरून काढण्यात आलं. पुरातत्त्व विभागाने त्यावरील वाळूचं आवरण दूर करण्याचं काम हाती घेतलं. आज या भग्न मंदिराचे गाभारा व बरेचसे भाग उध्वस्त अवस्थेत आहेत. कोणार्क समुद्रकाठी असल्याने हवामानाचाही बराच परिणाम होऊन मंदिराची खूप झीज झालेली दिसून येते. शिवाय मोंगल आक्रमणामध्ये मंदिराची खूप तोडफोड झाली.

१२०००हून अधिक कारागिरांनी १६ वर्ष अथक परिश्रम करून हे मंदिर उभं केलं होतं. त्यासाठी अमाप खर्च झाला. हे मंदिर रथाच्या रूपात आहे. दोन्ही बाजूंना दहा- दहा फूट उंचीची  १२ मोठी चाकं आहेत. या चाकांवर आणि देवळावर अप्रतिम कोरीव काम आहे. सात दिमाखदार अश्व, सारथी आणि सूर्यदेव असे भव्य मंदिर होते. मंदिराच्या शिल्लक असलेल्या भग्न अवशेषांवरून पूर्वीच्या देखण्या संपूर्ण मंदिराची कल्पना करावी लागते.

या दगडी रथाच्या वरील भागात मृदुंग, वीणा, बासरी वाजविणाऱ्या पूर्णाकृती सूरसुंदरींची शिल्पे कोरली आहेत. त्याखाली सूर्यदेवांच्या स्वागताला सज्ज असलेले राजा, राणी, दरबारी यांची शिल्पे आहेत. योध्दे, कमनीय स्त्रिया व बालके यांची उत्कृष्ट शिल्पे आहेत. त्याखालील पट्टयावर सिंह, हत्ती, विविध पक्षी, फुले कोरली आहेत. रथावर काम शिल्पे, मिथुन शिल्पे कोरलेली आहेत. त्यातील स्त्री-पुरुषांच्या चेहऱ्यावरील भाव लक्षणीय आहेत. आकाशस्थ सूर्यदेवांच्या अधिपत्याखाली पृथ्वीवरील जीवनचक्र अविरत चालू असते. त्यातील सातत्य टिकविण्यासाठी आदिम नैसर्गिक प्रेरणेनुसार सर्व जीवसृष्टीचे वर्तन असते असे इथे अतिशय कलात्मकतेने शिल्पबद्ध केलेले आहे.

भारतीय पुरातत्त्व खात्याची निर्मिती ही ब्रिटिशांची भारताला फार मोठी देणगी आहे. ब्रिटिश संशोधकांनी भारतीय संशोधकांना बरोबर घेऊन अतिशय चिकाटीने अजिंठा, खजुराहो, मोहनजोदारो, कर्नाटकातील शिल्पस्थानं यांचा शोध घेऊन त्यांचे संरक्षण व दस्तावेजीकरण केले. कोणार्क येथील काळाच्या उदरात गडप झालेले, वाळूखाली गाडले गेलेले सूर्यमंदिर स्वच्छ करून त्याचे पुनर्निर्माण केले. त्यामुळे ही सर्व शिल्परत्ने जगापुढे येऊन भारतीय समृद्ध संस्कृतीची जगाला ओळख झाली. आज हजारो वर्षे उन्हा- पावसात उभ्या असलेल्या, अज्ञात शिल्पकारांच्या अप्रतिम कारागिरीला प्राणपणाने जपणे हे आपले कर्तव्य आहे.  दरवर्षी १ डिसेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान कोणार्कला नृत्यमहोत्सव आयोजित केला जातो. त्यात प्रसिद्ध नर्तक हजेरी लावतात .

कोणार्कहून ३५ किलोमीटरवर ‘पुरी’ आहे. सागर किनाऱ्याने जाणारा हा रस्ता रमणीय आहे. आदि शंकराचार्यांनी आपल्या भारतभ्रमणाअंतर्गत भारताच्या चारी दिशांना जे मठ स्थापिले त्यातील एक म्हणजे पुरी. जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा या बहिण भावंडांचं हे मंदिर जगन्नाथ (श्रीकृष्ण ) मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. बाराव्या शतकात बांधण्यात आलेलं हे मंदिर अतिशय सुंदर आणि कलात्मक आहे. १९२फूट उंच असलेलं हे मंदिर इसवी सन अकराशे मध्ये अनंत वर्मन राजाने हे मंदिर बांधण्यास सुरुवात केली. त्याचा मुलगा अनंत  भीमदेव याच्या काळात ते पूर्ण झालं.

आषाढ शुद्ध द्वितीयेपासून त्रयोदशीपर्यंत साजरी होणारी ‘पुरी’ येथील रथयात्रा जगप्रसिद्ध आहे. साधारण ३५ फूट रुंद व ४५ फूट उंच असलेले तीन भव्य लाकडी रथ पारंपारिक पद्धतीने अतिशय सुंदर तऱ्हेने सजविले जातात. जगन्नाथ, सुभद्रा आणि बलभद्र यांच्या रथांना वाहून नेण्यासाठी प्रचंड जनसागर उसळलेला असतो. हे लाकडी रथ दरवर्षी नवीन बनविले जातात. त्यासाठी वापरायचं लाकूड, त्यांची उंची, रुंदी, कारागीर सारे काही अनेक वर्षांच्या ठराविक परंपरेनुसारच होते. हिंदूंच्या या पवित्र क्षेत्राचा उल्लेख  ‘श्री क्षेत्र’ किंवा ‘पुरुषोत्तम क्षेत्र’ म्हणून ब्रह्मपुराणात आढळतो. चैतन्य महाप्रभूंचं वास्तव्य या क्षेत्रात बराच काळ होतं.

महाराजा रणजीत सिंह यांनी या मंदिराला भरपूर सुवर्णदान केलं. त्यांनी आपल्या मृत्युपत्रात ‘कोहिनूर’ हिराही या मंदिरासाठी लिहून ठेवला होता पण त्याआधीच ब्रिटिशांनी पंजाबवर आपला अंमल बसविला व आपला कोहिनूर हिरा इंग्लंडला नेला .

ओडिशा भाग ३ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक २९ – भाग २ – कलासंपन्न ओडिशा ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २९ – भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ कलासंपन्न ओडिशा ✈️

भुवनेश्वर मधील मुक्तेश्वर म्हणजे शंकराचे मंदिर हे कलिंग शैली मंदिर कलेचा उत्तम नमुना आहे. प्रवेशद्वारावरील तोरणशिल्प अजोड सौंदर्याचा नमुना आहे.  प्रदक्षिणा मार्गावरून जाताना मंदिराबाहेर कोरलेल्या अतिशय सुंदर मूर्ती पाहता येतात.

परशुरामेश्वर मंदिराची निर्मिती सातव्या शतकात झाली असे मानण्यात येते. या छोट्याशा, सुबक मंदिराच्या भिंतींवर रामायण, महाभारत यातील अनेक प्रसंग कोरलेले आहेत. वेताळ मंदिरात आठ हातांची उग्र आणि भयकारी अशी चामुंडाची मूर्ती आहे. तांत्रिक पंथीयांच्या या उपासना देवतेला कपालिनी असे म्हणतात.

अनंत वासुदेव मंदिर हे भुवनेश्वर मधील आणखी एक प्रसिद्ध देवालय आहे. तेराव्या शतकात बांधलेल्या या मंदिरात कृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांच्या पूर्णाकृती  मूर्ती आहेत. भानुदेव राजाच्या कारकिर्दीत बांधलेले हे मंदिर वैष्णव पंथीयांचे एक प्रमुख तीर्थस्थान आहे.

भुवनेश्वरहून आठ किलो मीटर अंतरावर उदयगिरी आणि खांदगिरी या जुळ्या टेकड्यांवर गुहा कोरण्यात आल्या आहेत. गंग घराण्यातल्या राजा खारवेल याच्या जीवनातल्या काही घटना हत्ती गुंफेत कोरल्या आहेत. इथली ‘राणी गुंफा’ दुमजली असून भव्य आहे.

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक समृद्धता जपणाऱ्या या नगरीने आता अत्याधुनिक बदल स्वीकारलेले आहेत .जर्मन वास्तुविशारद ओ.एच्.किंग्जबर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली भुवनेश्वरचा विकास झाला. सॉफ्टवेअर पार्कस्,उत्तुंग आधुनिक इमारती, इंजिनिअरिंग कॉलेजेस, शॉपिंग मॉल याबरोबरच टाटा, जिंदाल, वेदांत, रिलायन्स अशा नावाजलेल्या उद्योगधंद्यांनी इथे मोठी गुंतवणूक केली आहे.  ओडिशा खनिजसमृद्ध असल्याने त्यावर आधारित उद्योगधंदे तसेच स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया(SAIL ) कलिंगनगरीत आहेत. महानदीच्या मुखावरील पारादीप या बंदराचा विकास करून तिथून ही खनिजे निर्यात केली जातात.

भुवनेश्वर येथील कलिंग स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये जागतिक स्तरावरील हॉकी, फुटबॉल यांचे सामने भरविले जातात. भुवनेश्वरपासून २०० किलोमीटर असलेल्या बालासोर इथे रॉकेट लॉन्चिंग सेंटर आहे. तसेच भुवनेश्वरपासून दीडशे किलोमीटरवर असलेल्या भद्रक येथील डॉक्टर अब्दुल कलाम आयलंड ( पूर्वीचे व्हिलर आयलंड ) इथून ‘अग्नी १,’ अग्नी २’ या लहान पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचं उड्डाण झालं. आत्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात भारताच्या ‘संरक्षण संशोधन आणि विकास’ संस्थेतर्फे डॉक्टर अब्दुल कलाम आयलंडवरून लांब पल्ल्याच्या ‘इंटरसेप्टर’  क्षेपणास्त्राची  यशस्वी चाचणी करून भारताने संरक्षण क्षेत्रात नवी भरारी घेतली आहे.

भुवनेश्वर हे ओडिशाच्या हस्तकौशल्याचे महत्त्वाचे केंद्र आहे. इथल्या दुकानातून दगडात कोरलेल्या वस्तू ,मूर्ती, पट्टापेंटिंग, वाळलेल्या पानांवरील रंगीत कलाकुसर, सिल्व्हर फिलीग्रीच्या (चांदीच्या बारीक तारांपासून बनविलेल्या कलाकुसरीच्या) सुंदर वस्तू व दागिने मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध असतात.         

इथल्या म्युझियममध्ये प्राचीन नाणी, शस्त्रास्त्रे, ताम्रपट, शिलालेख, पारंपरिक वाद्ये,  जुन्या पोथ्या, ओडिशात सापडणाऱ्या खनिज संपत्तीचे नमुने,   भुसा भरून ठेवलेले ओडिशातील प्राणी उत्तम तऱ्हेने मांडले आहेत. ओडिशातील आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे एक म्युझियम इथून जवळच आहे.

ओडिशा भाग २ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक२८ – भाग २ – राणी सातपुड्याची आणि राणी जंगलची ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २८ – भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ राणी सातपुड्याची आणि राणी जंगलची  ✈️

जबलपूरहून कान्हाला जाण्याआधी थोडी वाट वाकडी करून घुघुआ येथील जीवाश्म राष्ट्रीय उद्यान पाहिले. इथल्या म्युझियममध्ये वनस्पती व प्राणी यांचे जीवाश्म ठेवले आहेत. प्राणी अथवा वनस्पती मृत झाल्यानंतर सर्वसाधारण परिस्थितीमध्ये त्यांचे विघटन होते पण एखाद्या आकस्मिक घटनेमध्ये उदाहरणार्थ भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, अशा वेळी झाडे, प्राणी क्षणार्धात गाडली जातात. त्यावेळी ऑक्सिजन व जीवजंतूंच्या अभावी कुजण्याची क्रिया न होता त्या मृत अवशेषांमध्ये हळूहळू खनिज कण भरले जातात. कालांतराने तो जीव, वनस्पती यांचे दगडामध्ये परिवर्तन होते. यालाच जीवाश्म असे म्हणतात अशी माहिती तिथे लिहिली होती. येथील जीवाश्मांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यात आला आहे. म्युझियममध्ये अशी दगडी झाडे, डायनासोरचे अंडे, इतर शास्त्रीय माहिती, नकाशे आहेत. बाहेरील विस्तीर्ण वनामध्ये रुद्राक्ष, निलगिरी, फणस, आंबा, जांभूळ, आवळा, रानकेळी या वृक्षांचे जीवाश्म बनलेले बघायला मिळाले. संशोधनामध्ये या जीवाश्मांचे वय साडेसहा कोटी वर्षे आहे असा निष्कर्ष निघाला आहे. काही कोटी वर्षांपूर्वी आफ्रिका, भारतीय द्विपखंड, ऑस्ट्रेलिया हे सर्व एकमेकांना जोडलेले होते व हा भाग गोंडवन म्हणून ओळखला जात असे. कालांतराने हे भाग विलग झाले. बहुरत्ना वसुंधरा राणीचा हा अद्भुत खजिना पाहून कान्हाकडे निघालो.

प्रवासाच्या आधी जवळजवळ चार महिने आम्ही मुंबईहून बुकिंग केले होते. त्यामुळे प्रत्यक्ष कान्हाच्या अरण्यातील मध्यप्रदेश पर्यटन मंडळाचे किसली येथील गेस्ट हाऊस राहण्यासाठी मिळाले होते. दिवसभर प्रवास करून कान्हाला पोहोचलो तर जंगलातला निःशब्द अंधार दाट, गूढ झाला होता. गेस्ट हाऊस थोडे उंचावर होते. पुढ्यातल्या लांब- रुंद अंगणाला छोट्या उंचीचा कठडा होता. त्यापलीकडील मोकळ्या जंगलात जाण्यास प्रवाशांना मनाई होती कारण वन्य जीवांच्या जाण्या- येण्याचा तो मार्ग होता. जेवून अंगणात खुर्च्या टाकून बसलो. रात्रीच्या निरभ्र आकाशात तेजस्वी गुरू चमकत होता. थोड्याच वेळात झाडांच्या फांद्यांमागून चांदीच्या ताटलीसारखा चंद्रमा वर आला. उंच वृक्षांच्या काळोख्या शेंड्यांना चांदीची किनार लाभली.

दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता जंगल सफारीला निघालो तेव्हा पिवळसर चंद्र मावळत होता आणि शुक्राची चांदणी चमचमच होती. तिथल्या शांततेचा भंग न करता भोवतालचे घनदाट विशुद्ध जंगल बघंत जीपमधून चारी दिशा न्याहाळत होतो. साल, साग, करंजा, सिल्वर ओक, महानिंब, ओक, पाईन अशा प्रकारचे अनेक  वृक्ष होते.  ‘भुतांची झाडं'(ghost trees) होती. या झाडांचे बुंधे सरळसोट व पांढरे स्वच्छ असतात. काळोखात ते बुंधे चमकतात. म्हणून त्यांना ‘घोस्ट ट्रिज’ असे म्हणतात. तेंदू पत्ता, शिसम, महुआ, मोठमोठ्या बांबूंची दाट वने आणि उंच गवताळ सपाट प्रदेश, वेगवेगळे जलाशय यांनी हे जंगल समृद्ध आहे. कळपांनी फिरणाऱ्या, पांढऱ्या ठिपक्यांच्या  सोनेरी हरिणांचा मुक्त वावर होता. मोर भरपूर होते. लांडगा दिसला. गवा होता. झाडाच्या फांद्यांसारखी प्रत्येक बाजूला सहा सहा शिंगे असलेला बारशिंगा होता. निळकंठ, सुतार , पॅरकिट असे  पक्षी होते. एका झाडाच्या ढोलीत घुबडाची दोन छोटी गोजिरवाणी, वाटोळ्या डोळ्यांची पिल्ले स्तब्ध बसलेली दिसली. मुख्य प्रतीक्षा होती ती वाघोबांची! वनराजांचा माग काढत जीप जंगलातल्या खोलवर गेलेल्या वाटा धुंडाळत होती. अचानक सात- आठ जंगली कुत्रे दिसले. सभोवती चरत असलेला हरिणांचा कळप उंच कमानीसारख्या उड्या मारत विद्युत् वेगाने तिथून दूर निघून गेला. जीवाच्या आकांताने केकाटत मोरांनी उंच उड्या मारून झाडांचा आसरा घेतला. आणि एक बिचारे भेदरलेले हरिणाचे पिल्लू उंच गवतात आसरा घेऊ बघत होते तोपर्यंत त्या जंगली कुत्र्यांनी त्याला घेरले. आठ दहा मिनिटात त्या हरिण बाळाचा फक्त सांगाडा शिल्लक राहिला. कावळे आणि गिधाडे वरती घिरट्या घालू लागले. कुत्र्यांची टोळी आणखी सावज शोधायला निघून गेली. सृष्टीचा ‘जीवो जीवस्य जीवनम्’ हा कायदा अनुभवून आम्ही तिथून निघालो.

मध्यप्रदेश– राणी जंगलची भाग २ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक२८ – भाग १ – राणी सातपुड्याची आणि राणी जंगलची ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २८ – भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ राणी सातपुड्याची आणि राणी जंगलची  ✈️

मध्यप्रदेश म्हणजे भारताचे हृदयस्थान! विविधतेने नटलेला आपला भारत हा एक संपन्न देश आहे. नद्या, पर्वत, जंगले, समुद्र यांचे नैसर्गिक सौंदर्य आणि शिल्पकला, चित्रकला, लोककला, हस्तकला यांचा प्राचीन, संपन्न सांस्कृतिक वारसा आपल्याला लाभला आहे. मध्यप्रदेशमध्ये नर्मदा, शोण, चंबळ यासारख्या महानद्या, सातपुडा, विंध्य यांच्या पर्वतरांगा, हिरवीगार जंगले आणि भरपूर खनिज संपत्ती आहे.इथे आदिमानवाच्या काळातील गुहेतील चित्रकलेपासून खजुराहो, बेतवापर्यंतची अप्रतिम शिल्पकला अशा साऱ्यांचा संगम अनुभवता येतो.

सातपुडा पर्वतरांगांच्या कणखर सिंहासनावर राणीप्रमाणे आरुढ झालेले ठिकाण म्हणजे पंचमढी! भोपाळपासून पंचमढी साधारण दोनशे किलोमीटरवर आहे. तर पिपारीया रेल्वे स्टेशनला उतरून पंचमढीला जाण्यासाठी पन्नास किलोमीटरचा वळणावळणांचा सुंदर घाटरस्ता आहे. दुतर्फा असलेल्या साग,साल,महुआ, आवळा, जांभूळ अशा घनदाट वृक्षराजीतून जाणारी ही वाट आपल्याला अलगद पंचमढीला पोचवते.

ब्रिटिश कॅप्टन फॉरसिथ यांना १८५७ साली पंचमढीचा शोध लागला. कोरकू नावाची आदिवासी जमात हे इथले मूळ रहिवासी होते. ब्रिटिशांनी या थंड हवेच्या ठिकाणाचा काही काळ उन्हाळी राजधानी म्हणूनही उपयोग केला. त्यामुळे इथल्या इमारती, चर्चेस यावर तत्कालीन ब्रिटिश स्थापत्यशैलीचा प्रभाव आहे. सुंदर, स्वच्छ रस्त्यांवरून, स्थानिक छोट्या टुरिस्ट गाडीने आपल्याला तिथल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाता येते. मुख्य रस्त्यापासून ‘जमुना प्रपात’कडे जाणारा रस्ता उतरणीचा, खडबडीत दगड- गोट्यांचा आहे. दिवाळीच्या सुट्टीमुळे शाळेच्या सहली व इतर अनेक प्रवासी तिथे होते. पाण्याच्या एका वाहत्या प्रवाहात काहीजण डुंबण्याचा आनंद घेत होते . एक अगदी छोटा मुलगा प्रवाहाच्या काठावर बसून एकाग्रतेने हाताच्या ओंजळीत तिथले छोटे मासे येतात का ते पहात होता. प्रवाहावरील लाकडी साकव ओलांडून गेल्यावर पुढ्यात उंच डोंगरकडे व खोल दरी आली. तिथल्या प्रेक्षक गॅलरीतून एक हजार फूट खाली कोसळणाऱ्या धबधब्याच्या, उन्हात चमकणाऱ्या रुपेरी धारा नजर खिळवून ठेवतात.  अनेक उत्साही तरुण-तरुणी दुसऱ्या छोट्या अवघड वाटेने उतरून, धबधब्याच्या तळाशी पोचून मनसोक्त भिजण्याचा  आनंद घेत होते. उन्हाळ्यामध्ये इथल्या दगडी कपारीत मधमाशा मोठमोठी पोळी बांधतात म्हणून या धबधब्याला ‘बी फॉल (Bee Fall)’ असेही म्हणतात.

तिथून पांडव उद्यान बघायला गेलो. एका छोट्याशा टेकडीवर सॅ॑डस्टोनमधील बौद्धकालीन गुंफा आहेत. वनवासाच्या काळात पाच पांडवांनी इथे वस्ती केली होती व त्यावरून या ठिकाणाचे नाव पंचमढी असे पडल्याचे सांगतात. टेकडीभोवतीचे उद्यान विस्तीर्ण आणि अतिशय सुरेख ठेवले आहे.  नाना रंगगंधांची गुलाबाची बाग नजरेत भरत होती. हिरवळीवर निळ्या, केशरी, लाल, पिवळ्या फुलांचे ताटवे फुलले होते. कडेचे वृक्ष त्यांच्यावर चढविलेल्या रंगीत बोगन वेली, पिवळी कर्णफुले यांनी शोभत होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी ‘हंडी खो’ येथे गेलो. हे ठिकाण म्हणजे सरळसोट कातळांची खोलवर उतरलेली निबीड दरी आहे. नुसते वरून पाहूनच दरीचे रौद्रभीषण सौंदर्य डोळे फिरवीत होते. या ठिकाणी ‘हंडी’ नावाचा ब्रिटिश रेंजर दरीच्या तळाचा ठाव घ्यायला म्हणून गेला तो परतलाच नाही म्हणून या ठिकाणाला ‘हंडी खो’ म्हणजे हंडी साहेब खो गये असे नाव पडले आहे.

तिथून गुप्त महादेव बघायला गेलो. तिथल्या एका सरळसोट उंच वृक्षावरून तशाच दुसऱ्या उंच वृक्षावर शेकरू खारी उड्या मारत होत्या. शेकरू खारी आपल्या नेहमीच्या खारींपेक्षा आकाराने खूप मोठ्या व लांब झुबकेदार शेपूट असलेल्या असतात. आपल्याकडे भीमाशंकरला अशा शेकरू बघायला मिळतात. शेकरू खार महाराष्ट्राचा ‘राज्य प्राणी’ आहे. एका दगडी लांबट गुहेत एका वेळी जेमतेम दोन-तीन माणसे जाऊ शकतील एवढीच जागा त्या गुप्त महादेव मंदिरात होती. खोलवर शंकराची पिंडी होती. आणि डोंगरातील झऱ्यांचे पाणी त्यावर झिरपून वाहत होते. तिथून जवळ असलेले दुसरे महादेवाचे मंदिरही असेच होते पण ही गुंफा खूप मोठी लांबरुंद होती. मध्ये वाहता झरा होता. दोन्हीकडे खूप मोठमोठी माकडे आपल्या हातातील काहीही खेचून  घ्यायला टपलेली होती. या गुंफेच्या एका कडेला दुसरी गुंफा आहे. या गुहेच्या भिंतीवर आदिमानवाच्या काळातली पशुपक्षी, बिनसारखे वाद्य वाजविणारा माणूस अशी चित्रे कोरलेली आहेत.

४५०० फूट उंच असलेले धूपगड हे सातपुडा पर्वतश्रेणीतील सर्वात उंच शिखर आहे. वळणावळणाच्या रस्त्याने दोन्ही बाजूंच्या उंच  सुळक्यांमधून जीप वर चढत होती. मधल्या ‘नागफणी’ नावाच्या कड्यावर धाडसी तरूण  ट्रेकिंगसाठी जात होते. शिखरमाथ्यावर पोहोचलो तर सूर्यास्त पाहण्यासाठी खूप गर्दी लोटली होती. लांबरुंद दरीकडेच्या पर्वतश्रेणीवरील तरंगत्या ढगांच्या कडा सोनेरी तांबूस झाल्या होत्या. सूर्यदेव डोंगराआड अस्ताला जाण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात एका दाट राखाडी रंगाच्या मोठ्या ढगाने सूर्यबिंब झाकून टाकले. त्या ढगाच्या कडा सोनेरी तांबूस झाल्या. ढगाआडूनच सूर्यदेवांनी निरोप घेतला. निःस्तब्ध, हुरहुर लावणारी शांतता आसमंतात पसरली.

धूपगडच्या शिखर टोकावरील थोड्या मोकळ्या जागेत एक ब्रिटिशकालीन दणकट बंगला आहे. ब्रिटिशांची जिद्द, धाडसी सौंदर्यदृष्टी याचे काही वेळेला खरंच कौतुक वाटते. मोठमोठे चौकोनी चिरे व उत्तम लाकूड  वापरून बांधलेला हा सुबक बंगला शंभर वर्षांहून अधिक काळ लोटला तरी ऊन, वारा, पाऊस,  थंडी यांना तोंड देत सातपुड्यासारखाच ठाम उभा आहे. आता या बंगल्यात म्युझियम केले आहे. सातपुड्याची माहिती देणारे लेख, नकाशे व तिथल्या निसर्गाच्या विविध विभ्रमांचे उत्तम उत्तम मोठे फोटोग्राफ तिथे आहेत. तसेच स्थानिक कोरकू आदिवासींची माहिती, त्यांच्या प्रथा सांगणारे लेख व फोटोग्राफस् आहेत.

पंचमढीला मिलिटरीची तसेच राज्य पोलीस दलाची खूप मोठी ट्रेनिंग सेंटर्स आहेत. प्रवाशांसाठी पॅरासेलिंग, नौका विहार, सातपुडा नॅशनल पार्क अशी आकर्षणे आहेत. पुरातन अंबामातेच्या देवळाचा सुंदर जिर्णोद्धार केला आहे.  बेगम पॅलेसचे भग्नावशेष शिल्लक आहेत. इथले शंभर वर्षांपूर्वीचे  रोमन कॅथलिक चर्च बघायला गेलो.१८९२ मध्ये बांधलेले  हे सुबक सुंदर चर्च म्हणजे ब्रिटिश व फ्रेंच स्थापत्य शैलीचा नमुना आहे.चर्चच्या खूप उंचावर असलेल्या स्टेन्ड ग्लासच्या खिडक्यांवर लाल, निळ्या, पिवळ्या, जांभळ्या रंगांमध्ये सुंदर नक्षी, कमळे, येशू, मेरी यांची चित्रे आहेत. चर्च शेजारी दुसऱ्या महायुद्धातील इटालियन सैनिकांचे चिरविश्रांती स्थान आहे.

आमच्या भोजनगृहाचे नाव ‘अमलताश’ असे होते. अमलताश म्हणजे बहावा (कॅशिया )  वृक्ष इथे भरपूर आहेत. वैशाख महिन्यात या झाडांवरून सोनपिवळ्या रंगाचे लांबट गुच्छ डुलायला लागतात तेव्हा निसर्गदेवतेच्या कानातल्या झुमक्यांसारखे वाटतात. आपल्याकडेही बऱ्याच ठिकाणी हा वृक्ष दिसतो. तिथल्या मुचकुंदाच्या झाडांवर पोपटाच्या चोचीसारख्या आकाराच्या हिरव्या मोठ्या देठातून केशरी- लाल रंगाच्या पाच भरदार पाकळ्यांची फुले उठून दिसत होती. सतेज, प्रसन्न निसर्गसौंदर्याला कुर्निसात करून सातपुड्याच्या राणीचा निरोप घेतला.

मध्यप्रदेश भाग १ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक २७ – भाग ३ – आसामी सिल्कचा, पदर भरजरीचा ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २७ – भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ आसामी सिल्कचा, पदर भरजरीचा ✈️

ब्रह्मपुत्रेवरील साडेतीन किलोमीटर लांबीचा पूल आपल्या भारतीय अभियंत्यांनी बांधलेला आहे. आता असे आणखी दोन पूल ब्रह्मपुत्रेवर बांधले आहेत. ब्रह्मपुत्रा तिबेटमध्ये मानस सरोवराजवळ उगम पावते. नंतर विशाल पर्वतराजीतून वाहत आसामच्या खोऱ्यात प्रवेश करते. तिला दिनांग,सेसिरी,तिस्ता अशा उपनद्या येऊन मिळतात. प्रवाहाची अनेक वळणे बदलत ती बांगलादेशातून बंगालच्या उपसागराला मिळते .जलवाहतुकीचे हे एक उत्तम साधन आहे. अशी ही आसामची जीवनवाहिनी कधी कधी आसामचे अश्रू सुद्धा होते. प्रवाह एवढा प्रचंड आणि वेगवान की तिला ब्रह्मपुत्रा नद (नदी नव्हे ) असेच संबोधले जाते. तिचा प्रवाह सतत बदलतो. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडतो. सुपीक जमीन पाण्याखाली जाते. माणसे, जनावरे वाहून जाणे हा वार्षिक शिरस्ता आहे. ब्रह्मपुत्राकाठच्या एका गणपती मंदिरात दर्शन घेऊन नदीकाठी गेलो. संध्याकाळच्या सोनेरी प्रकाशात ब्रह्मपुत्रेच्या विस्तीर्ण, गहन गंभीर पात्रावर भरजरी सोनेरी पदर पसरल्यासारखे वाटत होते.

गुवाहाटीमध्ये नीलांचल डोंगरावरील कामाख्या मंदिर हे देवीचे- आदिशक्तीचे- शक्तिपीठ मानले जाते. देऊळ खूप प्राचीन आहे. देवळात खूप काळोख असल्याने व बॅटरीसुद्धा लावायला परवानगी नसल्याने फार काही बघता आले नाही. अजूनही इथे बकरा, रेडा यांचे बळी दिले जातात.

ईशान्य भारतात दगडी कोळशापासून युरेनियमपर्यंत सर्व खनिजे विपुल प्रमाणात आहेत. दिग्बोई इथे तेल शुद्धीकरण रिफायनरी आहे. चहाच्या उत्पादनात जगात पहिला नंबर आहे. घनदाट जंगले, दुर्मिळ वनस्पती,विविध प्राणी, पक्षी आहेत. एक शिंगी गेंडा ही आसामची खासियत आहे. या शिंगात हाड नसते. गेंड्याचे शिंग औषधी असते या समजुतीने त्याची अवैध शिकार केली जाते. इथले मलबेरी, मुंगा, टसर हे सिल्क प्रसिद्ध आहे.

या संपूर्ण प्रदेशाला हिरव्या रंगाच्या नाना छटा असलेले अक्षय सौंदर्य लाभले आहे. या हिरव्या हिरव्या सिल्कला ब्रह्मपुत्रेचा झळाळता सोनेरी पदर आहे पण— पण इथला अस्वस्थपणा, अशांतपणा मध्ये मध्ये उफाळून येतो. हे गिरीजन अतिशय संवेदनशील आहेत. आपापसातही त्यांचे रक्तरंजित खटके उडत असतात. शिवाय स्वातंत्र्योत्तर या भागाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे शल्य त्यांच्या मनात आहे. या ईशान्य भारताच्या सीमांना भूतान, तिबेट, बांगलादेश, ब्रह्मदेश यांच्या सीमा खेटून आहेत. १९६२ च्या युद्धात चिन्यांनी तेजापूर घेतले होते.

या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम, रामकृष्ण मिशन यांचे अखंड यज्ञासारखे काम चालू आहे. तिथल्या लहान मुला- मुलींची महाराष्ट्रातल्या शाळातून शिक्षणाची, वसतिगृहाची सोय करण्यात येते. आता तिथे कॉम्प्युटरवर आधारित उद्योगांचे, आयटी इंडस्ट्रीजची उभारणी होत आहे.

परत येताना गुवाहाटी- मुंबई असे विमान संध्याकाळी चारचे होते. आमच्या तेथील रिझर्व बँकेतल्या सहकार्यांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे आम्ही विमानात उजव्या बाजूच्या खिडक्या मागून घेतल्या होत्या. विमानाने आकाशात झेप घेतल्यावर पाचच मिनिटात उजवीकडे एव्हरेस्टच्या बर्फाच्छादित रांगा सूर्यकिरण पडल्याने सोन्यासारख्या चमकताना दिसल्या. नकळत डोळ्यात पाणी आले. हात जोडले गेले.  अस्वस्थ ईशान्य भारताबद्दलच्या विचारांना आशेची सोनेरी किनार लाभली.

भाग ३ व आसाम समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares