मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “आधुनिक भस्मासुर” – लेखक : मंदार गद्रे ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “आधुनिक भस्मासुर” – लेखक : मंदार गद्रे ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : आधुनिक भस्मासुर  

… अकाली जीवनशैलीच्या आजारांचं वास्तव आणि उपाय

लेखक : मंदार गद्रे 

 (औषधांपासून मुक्ती देणारा ‘डॉक्टर’)

पृष्ठे: १८४

मूल्य: २७०₹ 

लेखकाचे मनोगत

जीवनशैलीचे आजार जगभरात धुमाकूळ घालतायत. आज जवळपास प्रत्येक घरामध्ये हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, पीसीओडी, फॅटी लिव्हर, किडनीचे विकार, विस्मरण बळावले आहेत. या सर्व आजारांशी लढताना जगभरातच सामान्य माणूस आणि वैद्यकीय यंत्रणा यांच्या नाकी नऊ आलेले आहेत. आणखी एक चिंतेची बाब अशी की हे सर्व चित्र दिवसेंदिवस बिघडतच चाललं आहे.

या आजारांमागचं जीवशास्त्र स्पष्ट समजून घेण्याची आज मोठी गरज आहे. त्याशिवाय ‘हा पदार्थ खा किंवा तो टाळा’ या प्रकारच्या वरवरच्या सल्ल्यांपेक्षाही मूलभूत असं मानवी आहाराचं शास्त्र मांडण्याची नितांत गरज आहे.

हे आजार जिथून निर्माण झाले, तिथेच ते सोडवण्याची उत्तरंही शोधावी लागतील. नाहीतर, कुठेतरी रानात हरवलेली वस्तू, केवळ उजेड आहे म्हणून रस्त्यावरच्या दिव्याखाली शोधण्याचीच चूक आपण करू खरं तर करतोच आहोत.

जीवनशैलीच्या आजारांवरची औषधं ही मुख्यतः लक्षणांवर तात्पुरता उपाय करणारी आहेत. म्हणजे आग लागलेली आहे, त्यातून काळा धूर येतो आहे, तर तो धूर इकडे-तिकडे पसरवून त्याचा त्रास कमी करणे असलं काम ही औषधं करतात. अश्या पंख्यांचा एक मर्यादित उपयोग जरूर असतो, पण म्हणून आपण असे पंखे लावून आग तशीच ठेवत नाही! ती विझवण्याच्या मागे लागतो! त्याचमुळे माझं स्पष्ट म्हणणं आहे की जीवनशैलीच्या आजारांशी लढण्यासाठी, औषधं-शस्त्रक्रिया ही मुख्य उत्तरं नाहीतच!

‘जीवनशैलीत योग्य बदल करा’ हे आपण शेकडो वेळा ऐकलं असेल. पण म्हणजे नक्की काय, आणि महत्त्वाचं म्हणजे तसं का-याचं स्पष्ट उत्तर आपल्याला मिळतच नाही. मतप्रदर्शनाच्या मार्गाने हे सल्ले आपल्याला दिले जातात, आणि विज्ञानाचा विद्यार्थी ह्या नात्याने माझं त्यामुळे कधीही समाधान झालं नाही. माझी ही जिज्ञासा मला मानवी उत्क्रांती, जैव रसायन, आंतरिक आरोग्य अश्या अनेक वाटांनी घेऊन गेली. ह्या प्रवासात जे सापडलं ते सुसंगतपणे मांडावं, ह्या सर्व विषयातलं सौंदर्य बाकीच्यांपर्यंत पोचवावं अश्या तीव्र इच्छेने हे पुस्तक लिहून झालं आहे.

आरोग्याची समस्या सोडवण्यासाठी मी अश्या दृष्टिकोनाच्या शोधात होतो ज्यातून योग्य उपाय सहज समजून यावेत. हे उपाय विज्ञानाचा मजबूत आधार असलेले, आणि रोजच्या आयुष्यात करण्याजोगे असावेत. पण हे उपाय नुसतेच न सांगता त्यामागचा दृष्टिकोन आणि विचारसंगती सांगावी म्हणून हा लेखनप्रपंच!

मानवी आहार आणि वर्तनातली मूलभूत आणि चिरकाल टिकणारी अशी काही तत्त्वं आहेत आणि ती वापरून जीवनशैलीच्या रोगांची आगच मुळातून विझवता येते! आपलं जैव-रसायन समजावून घेऊन, आहार आणि वर्तनात योग्य बदल करून, शरीराला अश्या स्थितीला नेता येतं की जिथे हे रोग शरीरात राहू शकत नाहीत! रोग परतणं, आणि त्यामुळे लक्षणांवर दिलेली औषधं सुटणं हे केवळ परिणाम आहेत. मुख्य काम हे शरीराला आतून स्वस्थ-सुदृढ करण्याचं आहे! या विषयाचा खोलवर अभ्यास करून आता हेच काम मी करतो. गंमत म्हणजे माझ्याकडे डॉक्टर मंडळीही त्यांच्या शरीरातली अशी आग विझवायला येतात! आंतरिक आरोग्याचा अभ्यासक म्हणून मी डॉक्टरांचाही डॉक्टर झालोय-औषधांपासून मुक्ती देण्याचं काम करतोय. आरोग्यावरच्या पुस्तकाचा लेखक माझ्यासारखा अभियंता कसा याचं खरं उत्तर हेच आहे.

अनुक्रमणिका ::: 

१. सत्यकथा

२. आपली नेमकी समस्या काय आहे?

     पहिली अडचणः जीवनशैलीच्या आजारांचं भयानक वास्तव 

     दुसरी अडचणः माहितीचा भडिमार तिसरी अडचणः मूलभूत विचाराचा अभाव

३. आरोग्य म्हणजे नक्की काय?

आंतरिक आरोग्याची कसोटी

. शरीराकडे आपण कसं पाहतो? संप्रेरकांची निरोगी क्रिया आणि बिघडलेली क्रिया

. ग्लुकोज, इन्सुलिन आणि इन्सुलिन विरोध

     शरीरातली समस्थिती (Homeostasis) इन्सुलिन विरोध

. रोगांच्या मुळाशी जातांना 

७. इन्सुलिन आणि जीवनशैलीचे आजार

. इन्सुलिन आणि लठ्ठपणा

. आपण इथवर कसे आलो?

१०. इन्सुलिन विरोध आणि उच्च रक्तदाब

११. कोलेस्टेरॉल बद्दल थोडंसं..

१२. इन्सुलिन आणि हृदयविकार

१३. इन्सुलिन आणि थायरॉईड

१४. इन्सुलिन आणि पीसीओडी

१५. इन्सुलिन आणि मूत्रपिंडांचे आजार

१६. इन्सुलिन आणि फॅटी यकृत (Fatty Liver)

१७. इन्सुलिन आणि अल्झायमर्स, विस्मरण

१८. इन्सुलिन आणि अकाली वृद्धत्व

१९. मानवी आहाराचा मूलभूत आराखडा

२०. आपण अन्नाकडे कसं बघतो?

२१. अ) काही प्रमुख गैरसमज : स्निग्ध पदार्थ, प्रथिनं, आणि कर्बोदकं 

     आ) काही प्रमुख गैरसमज मीठ, तंतुमय पदार्थ, फळं

२३. काही तंत्र आणि मंत्र

२४. दीर्घ आजारांचं (आणखी!) व्यापक चित्न कीटोजेनिक (कीटो) डाएट म्हणजे काय?

२५. धोक्याची घंटा आणि काही चांगल्या बातम्या! हळूहळू बदलणारे जागतिक चित्र

भारतातील आंतरिक आरोग्याच्या चळवळीचे जनक : dLife चे अनुप सिंग!

– – – अनुपचा कमी-कर्बोदकं (Low-Carb) पॅटर्न! dLife चा प्रवासः आज आणि उद्या!

शेवटी – माझ्या काही केसेस!

….

वर मुद्दामच पुस्तकाची अनुक्रमणिकाही दिलेली आहे जी पुस्तकातल्या तपाशीलाबाबत पुरेशी बोलकी आहे.

या पुस्तकात लेखक मंदार गद्रे यांनी व्यक्त केलेले त्यांचे मनोगत वाचल्यावर पुस्तकाचा वेगळा परिचय करून देण्याची गरजच उरत नाही असं मला खात्रीने म्हणावसं वाटतं.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “येसूबाई” – लेखिका : सुश्री सुलभा राजीव ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “येसूबाई” – लेखिका : सुश्री सुलभा राजीव ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : येसूबाई

लेखिका : सुलभा राजीव

प्रकाशन:उत्कर्ष प्रकाशन

चौथी आवृत्ती 

पृष्ठ:४९३ 

मूल्य:६००/

कितीही संकटं आली तरीही खंबीरपणे उभे राहण्याची प्रेरणा देणारे चरित्र! महाराणी येसूबाई!

पती छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुध्द कट शिजला. घरच्याच मंडळींनी कारस्थानं केली!सासूबाईंनी शंभुराजांना कैद करण्यासाठी सैन्य पाठवले होते!स्वराज्याचे निम्म्याहून अधिक कारभारी कारस्थानात गुंतलेले! माहेर वतनदारीसाठी विरोधात गेलेलं……… सासर आणि माहेर दोन्ही परके!तरीही संभाजी महाराजांच्या पाठीमागे भक्कमपणे उभ्या राहिल्या! नऊ वर्षांचा तो संभाजी महाराजांच्या राज्याचा झांजवती काळ, रोजच लढाई!

आप्तांच्या फितुरीने केलाला घात!पती छत्रपती संभाजी महाराजांना झालेली कैद आणि पतीची क्रूर हत्या!छत्रपती संभाजी महाराजांची जिवंतपणी आणि बलिदान झाल्यानंतरची विटंबना! रायगड स्वराज्याची राजधानी! राजधानीवर चालून आलेला शत्रू!रायगड शर्थीने झुंजायचा….. पतीच्या निधनाचे दुःख करत बसायला ही वेळ मिळाला नाही!

रायगडाचा पराभव! आणि तब्बल २९ वर्षांची कैद!ज्या स्वराज्यासाठी हे सर्व भोगलं त्यासाठी परत भाऊबंदकी आणि ताराराणी यांच्याशी कलह… तरीही येसूबाई उभ्या राहिल्या! त्यांच्यावर आलेली संकटं इतिहासातील कोणत्याही स्त्रीवर आलेली नाहीत, इतकी वाईट आणि भयंकर! तरीही त्या लढत राहिल्या… आपल्यासाठी एक आदर्श जीवन उभे राहिले…. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण प्रत्यक्ष जीवनात उतरणार ही महान त्यागमूर्ती “महाराणी येसूबाई”!

महाराणी येसूबाई!छ्त्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांना कुळमुखत्यार म्हणून नियुक्त केले होते! श्री सखीराज्ञी जयति!

छ्त्रपती संभाजी महाराजांसारख्या परम प्रतापी राजपुत्रासोबत ज्यांचा विवाह झाला आणि गाठ बांधल्या गेली स्वराज्याच्या रक्षणाची! त्या सोबत येणाऱ्या अग्नीदिव्यांशी! त्यागशी आणि हौतम्याशी!

आयुष्याची २९ वर्षे कैद! त्या आधीचा गृह कलह! कट आणि कारस्थाने! पतीची, स्वराज्याच्या छत्रपतींची क्रूर हत्या! त्यात ही खचून न जाता नऊ महिने रायगड लढविणाऱ्या येसूबाई! धोरणी मुत्सद्दी आणि त्यागाची मूर्ती म्हणजे येसूबाई! पोटाचा पुत्र लहान असल्याने राजाराम महाराज यांना छ्त्रपती म्हणून अभिषिक्त करणाऱ्या त्यागमुर्ती! राजाराम महाराजांना रायगडावरून सुखरूप जिंजी कडे पाठवून देतात आणि स्वतःला मात्र जन्माची मोगली कैद!

डॉ सदाशिव शिवदे यांच्या मार्गदर्शनाखाली लिहिलेली ही भव्य कादंबरी!

तब्बल ४२ संदर्भ ग्रंथांचा आधार घेऊन लिहिलेली ही कादंबरी वाचताना वाचक इतिहासाचा भाग होऊन जातो ! लेखिकेने अतिशय नेकिने आणि मेहनतीनं आणि मोठ्या कष्टानं ही कादंबरी लिहून पूर्ण केली आहे. कादंबरी लेखन चालू असतानाच लेखिका स्वतः ही कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी लढत होत्या. प्रचंड वेदना आणि भयंकर असे उपचार चालू असताना अभ्यास आणि लेखनात खंड पडणार नाही याची काळजी घेत होत्या. त्यांनी त्या दुर्धर रोगावर यशस्वी मात केली. आपल्याला ही अमूल्य अशी कादंबरी मिळाली….. नियतीशी झुंज देण्याची प्रेरणा मात्र त्यांना झुंजार येसूबाई यांच्याच जीवनातून मिळाली !२९ वर्षे कैदेत राहूनही त्यांनी हार मानली नाही! कदाचित लेखिकेच्या या परिस्थितीमुळे पुस्तकात मुद्रणदोष शिल्लक राहिले असतील असं वाटतं. हे मुद्रण दोष असूनही कादंबरीची साहित्य म्हणून जी उंची आहे ती अतिशय भव्य आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर छावा, संभाजी सारख्या मैलाचा दगड ठरलेल्या लोकप्रिय कादंबऱ्या असताना महाराणी येसूबाई यांच्या जीवनावरील कादंबरी लिहिणं खूप आव्हानात्मक काम होतं… जे लेखिकेने पूर्ण केलं आहे.

प्रत्येकाने हे चरित्र वाचून आत्मसात केलं तर आयुष्यातील संकटाना सामोरे जाण्याची तयारी होईल… लहान लहान संकटाना सामोरे जाताना मोडून पडणारी आपली पिढी खंबीर होऊन उभी राहील !

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ वेध अहिल्याबाईंचा – लेखक : डॉ. देवीदास पोटे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “वेध अहिल्याबाईंचा” – लेखक : डॉ. देवीदास पोटे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : “ वेध अहिल्याबाईंचा “ 

लेखक : डॉ. देवीदास पोटे.

प्रकाशक : परममित्र पब्लिकेशन्स 

पृष्ठ : ५११ 

किंमत : रु. ९००/

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची 300 वी जयंती देश वर्षभर साजरा करत आहे. या वर्षात आपणही निश्चित कोठे न कोठे सहभागी होणार असू, काही कार्यक्रम स्वतः घेणार असू… अशा वर्षात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या संदर्भात संपूर्ण माहिती देणारा “वेध अहिल्याबाईंचा” हा ग्रंथ आपल्या संग्रही असायलाच हवा. ! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावरील सर्व दृष्टीनं लिहिलेला ग्रंथ… ज्यात देवींच्या चरित्रापासून त्यांच्यावर लिहिलेल्या कवनापर्यंत… समग्र ! प्रत्येकाच्या घरी असावा असा हा ग्रंथ!

“अहिल्याबाईंची तुलना रशियाची साम्राज्ञी कॅथरीन, इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी होते. ” असं लॉरेन्स म्हणतो….

अहिल्याबाईं होळकर विश्वाच्या इतिहासातील एक अभूतपूर्व व्यक्तिमत्व आहे. ती एक धर्मशील आणि कर्तव्यनिष्ठ महाराणी होती. कर्मयोगिनी आणि राज्य योगिनी होती. आपले राज्य शिवार्पण केलेली शिवयोगीनी होती. प्रजाजनांची लोक माता होती. अहिल्याबाईंची कारकीर्द इतिहासाच्या पानांवरील एक तेजस्वी यशोगाथा आहे. अहिल्याबाई हे समर्पित कल्याणकारी राज्यकारभाराचे प्रतीक आहे. राजनीतीला समभाव, उदारमतवाद आणि सहिष्णुता यांची जोड देऊन त्यांनी भारतीय परंपरेत एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. अहिल्याबाईंच्या विविध अनोख्या गुणांचा आणि त्यांच्या विश्वात्मक विचारधारेतील विविध पैलूंचा अविष्कार या ग्रंथात आणि समर्थपणे मांडला आहे. अहिल्याबाईच्या कारकिर्दीतील इतिहासाची सोनेरी पाने म्हणजे त्यांच्या अनेकांगी कर्तृत्वाचा लखलखता आलेख आहे. पुण्यश्लोक आहिल्याबाई यांच्या लोकोत्तर व्यक्तिमत्वाचे आणि लोककल्याणकारी कार्याचे पैलू पुन्हा पुन्हा वाचावे, अभ्यासावे, स्मरणात ठेवावे आणि अनुसरावे असे आहेत. हा ग्रंथ आपल्या सर्वांना एक उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगी ठरेल असा विश्वास आहे. *

ग्रंथात एकूण १०९ प्रकरणे, शेकडो संदर्भ ग्रंथ आणि चित्रे आहेत.

त्यातील एक प्रकरण आहे, ‘ अहिल्याबाई :मान्यवरांच्या नजरेतून ! ‘ येथे संक्षेपाने उल्लेख करतोय. जगातील अनेक कीर्तिवंत, बुद्धिवंत, साहित्यिक, विद्वानांनी, राजांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या बाबत काढलेले उद्गार या पुस्तकाच्या या एका प्रकरणात आहेत…

महादजी शिंदे म्हणतात, ‘अशा महान मातेच्या पोटी जन्म घ्यावा. ‘ तर प्रथम तुकोजी होळकरांची वाक्य आहेत, ” साक्षात मार्तंड येऊन बोलला तरी मातोश्रींच्या पायाशी अंतर होणार नाही. “

जदुनाथ सरकार लिहितात, “अहिल्याबाईबद्दल माझा आदर माहेश्वरातील त्यांच्याविषयीची कागदपत्रे पाहून अमर्याद वाढला. राज्यपदारुड असता, मालकीची धनदौलत असता साधेपणाने राहणारी, धार्मिक प्रवृत्तीची महिला म्हणजे साक्षात देवी आहे. तिने देवळे बांधली, घाट बांधली, दान धर्मात पुष्कळ पैसा खर्च केला. जमिनी, गावे इनाम दिली. महेश्वरातील त्यांच्या वास्तव्यामुळे महादजी शिंदे सारख्याचा पराक्रम गाजला. तिच्या सहकार्याशिवाय महादजीस राजकारणात महत्त्व मिळाले नसते. “

या प्रकरणात इतर अनेक मान्यवरांची आदरांजली आणि उद्गार आहेत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावरील हा समग्र ग्रंथ प्रत्येकाच्या घरी असावा इतका सुंदर आहे.

ह्या ग्रंथाचे प्रकाशक कै. माधवराव जोशी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. त्यांनी हे फार मोठे कार्य केलं आहे… त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “फॉरेन बायोग्राफीज ऑफ राजा शिवछत्रपती” – लेखक – श्री सुरेन्द्रनाथ सेन  – मराठी अनुवाद – श्री रोहित पवार ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “फॉरेन बायोग्राफीज ऑफ राजा शिवछत्रपती” – लेखक – श्री सुरेन्द्रनाथ सेन  – मराठी अनुवाद – श्री रोहित पवार ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक :  फॉरेन बायोग्राफीज ऑफ राजा शिवछत्रपती 

(परकीयांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराज) 

मूळ लेखक : सुरेंद्रनाथ सेन

मराठी अनुवाद : रोहित पवार

पृष्ठे:३७२ 

मूल्य: ४९९₹ 

परकीय प्रवाशांनी शिवरायांचे लिहिलेले चरित्र आणि समक्ष भेटून केलेल्या नोंदी यांचा हा एक अस्सल दस्तावेज…..

सतराव्या शतकात पोर्तुगीज, डच, फ्रेंच व इंग्रजांनी भारताच्या विविध भागांत वखारी स्थापन करून आपापले बस्तान बसवले होते. या व्यापाऱ्यांबरोबर प्रवासी, वैद्य, अधिकारी आणि धर्मप्रसारकही भारतात आले. इथली संस्कृती, लोकांचे राहणीमान यांबद्दल त्यांनी आपल्या प्रवासवर्णनांतून, अहवालातून किंवा चरित्रातून नोंदी करून ठेवल्या. काही परकीयांनी छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती ऐकून, काहींनी त्यांना समक्ष भेटून नोंदी केल्या.

या सर्व परकीय प्रवाशांनी केलेल्या या नोंर्दीचा इंग्रजी अनुवाद सुप्रसिद्ध इतिहासकार सुरेंद्रनाथ सेन यांनी एक शतकापूर्वी केला होता. त्याचा हा मराठी अनुवाद म्हणजे इतिहास अभ्यासक, संशोधक आणि शिवप्रेमींसाठीचा एक अस्सल दस्तऐवज आहे.

संपूर्ण शिवचरित्र लिहिणारा पोर्तुगीज चरित्रकार कोस्मी द ग्वार्द

शिवाजी महाराजांचे स्वप्न अगदी कौतुकाने ऐकणारा फ्रेंच प्रवासी अॅबे कॅरे

शिवाजी महाराजांच्या सुरतलुटीचे वर्णन करणारा डच अधिकारी फ्रांस्वा व्हॅलेंटाइन

रायगड किल्ल्याचे ‘अभेद्य’ असे गुणवैशिष्ठ्य सांगणारा इंग्रज व्यापारी थॉमस निकल्स

शिवराज्याभिषेकास स्वतः उपस्थित राहून राजधानी रायगडावरील या सोहळ्याचे वर्णन करणारा इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्झिंडेन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेचे बारकावे सांगणारा फ्रेंच अधिकारी फ्रांस्वा मार्टिन

– – – अशा अनेक परकीयांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराजांचे बहुरंगी व्यक्तिमत्त्व आपल्या समोर उभे राहते.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “मायबोली रंग कथांचे” – संपादन : श्री सचिन वसंत पाटील ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “मायबोली रंग कथांचे” – संपादन : श्री सचिन वसंत पाटील ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆ 

पुस्तक – मायबोली रंग कथांचे

संपादक – सचिन वसंत पाटील

प्रकाशक – शब्दान्वय प्रकाशन, मुंबई

पृष्ठ संख्या – १८८

मूल्य – ३०० रुपये

नुकताच एक कथासंग्रह वाचला. ‘मायबोली, रंग कथांचे’. या कथासंग्रहाचे वेगळेपण असे, की या बोली भाषेतील निवडक कथा आहेत. बोली भाषा म्हंटलं, की आपल्याला चटकन आठवतात, त्या म्हणजे वर्‍हाडी, दख्खनी, मालवणी, अहिराणी, कोकणी, ठाकरी, आगरी इत्यादि. पण यात अशा काही बोली भाषेतील कथा आहेत, ज्यांची नावे मी तरी प्रथमच वाचली. उदा. तावडी, पोवारी, झाडी, लेवा गणबोली, गोंडी बोली, तडवी भिल, भीलाऊ या बोली भाषेतील कथाही यात आहेत. या कथांचे संकलक आणि पुस्तकाचे संपादक सचीन वसंत पाटील आहेत आणि प्रकाशक आहेत, शब्दान्वय प्रकाशन, मुंबई.

श्री सचिन पाटील

सचिन पाटील यांनी संपादकीयात लिहिले आहे, असे पुस्तक काढायची कल्पना मनात आल्यापासून सगळी जुळणी करेपर्यंत चार वर्षे गेली. काही मासिकातून, दिवाळी अंकातून आलेल्या कथा वाचून, काही मित्र परिवाराकडे चौकशी करून, काही त्यांचे स्वत:चेच मित्र होते, त्यांच्याशी बोलून त्यांनी कथांचे संकलन केले. गोवर्धन पर्वत उचलण्यासारखेच हे काम. त्यांनी ते लीलया केले, असे मी मुळीच म्हणणार नाही. त्यांनी त्यासाठी भरपूर परिश्रम केले. बोली भाषेशी संबंधित पुस्तके वाचली. कथाकारांशी आणि मित्रांशी चर्चा केली. गुगलवरून माहिती मिळवली. त्या माहितीवर केवळ विसंबून न राहाता, तज्ज्ञांशी त्याबाबत चर्चा केली. यातून सिद्ध झाले पुस्तक ‘मायबोली रंग कथांचे’.

पुस्तकाची मांडणी अगदी नेटकी आहे. सुरूवातीला संपादकियात बोलीभाषांचे महत्त्व विषद केले आहे. त्यांतर विविध २२ बोलीभाषांची थोडक्यात माहिती दिली आहे. ती बोलीभाषा कोणत्या प्रदेशात बोलली जाते, त्यांचे वैशिष्ट्य काय, त्या भाषेत लिहिणारे महत्त्वाचे लेखक-लेखिका कोणते इ. माहिती येते. नंतर बोली भाषेतील २२ कथा आहेत. प्रत्येक कथेखाली आपल्याला अपरिचित शब्दांचे अर्थ दिले आहेत. अर्थात अनेक शब्दांचे अर्थ द्यायचे राहूनही गेले आहेत. कथांच्या शेवटी ती लिहिणार्‍या कथाकारांचे संक्षिप्त परिचय दिले आहेत. तिथे त्या त्या लेखकांचे फोन – मोबाईल नंबर दिले असते, तर वाचकांना त्यांच्याशी थेट संपर्क साधून आपल्या प्रतिक्रिया कळवता आल्या असत्या. मलपृष्ठावर मराठी अभ्यासक डॉ. संदीप सांगळे लिहितात, ‘प्रमाण भाषेला समृद्ध करण्याचे काम बोलीभाषा करतात. प्रमाण भाषा ही मुख्य रक्तवाहिनी सारखी काम करते, तर बोली भाषा या तिच्या धमण्या आहेत. आपला खास असा भाषिक ऐवज त्या मराठीला दान करतात. मराठीच्या अनेक बोलीभाषा आहेत. त्यांची विपुल अशी शब्दसंपदा आहे. भाषेला ऐश्वर्यसंपन्न बनवण्याचे कार्य ग्रामीण भागातील बोली करत आहेत. ’ 

पुस्तकाचे मुखपृष्ठ अतिशय आकर्षक, वेधक, समर्पक आहे. वारली शैलीतील हे चित्र आहे. फेर धरून कथानृत्य करणार्‍या भाषा भगिनी वर्तुळ करून नाचताहेत आणि या वर्तुळाच्या मधे तारपा नावाचे वाद्य वाजवणारी स्त्री दिसते आहे. आदिवासी नृत्याच्या वेळी लाकूड आणि कातडे यापासून बनवलेले हे वाद्य वाजवले जाते. काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर फेर धरून नाचणार्‍या स्त्रिया आणि तारपा वाजवणारी स्त्री पांढर्‍या रंगात आहे. ते वाद्य जणू म्हणते आहे, ‘आमच्याकडे बघा… आमच्याकडे बघा… ’ प्रतिकात्मक असे हे मुखपृष्ठ वाटले मला.

या कथासंग्रहातील पहिली कथा आहे, ‘डफडं’. डॉ. अशोक कोळी हे या कथेचे लेखक. ‘कोरोना’सारख्या जागतिक महामारीमध्ये खेडेगावातील आलुतेदार, बलुतेदार, पुजारी, मागतकरी यांची कशी उपासमार झाली, ते यात सांगितलं आहे. घरादाराच्या पोटासाठी डफडं वाजवून उपजीविका करणारा माणिक. या काळात काही न मिळाल्याने कसा हतबल होतो, त्याचा आक्रोश या कथेत मांडला आहे. कथाशयाबरोबरच त्या भागातील, लोकजीवन आणि लोकसंस्कृतीची, प्रथा-परंपरांची माहितीदेखील यात होते. गावात लग्न -समारंभ, नवस फेडणे इतकंच काय मर्तिकाच्या वेळीही मिरवणूक काढायची रीत. त्यावेळी डफडं वाजवून माणिकला पैसे मिळत. तशीच अमोशा (अमावास्या) मागायची पद्धत, या चाली-रीतीही कळून येतात. कोरोनामुळे मिरवणूकीवर बंदी आली आणि माणिकचं डफडं वाजवणं थांबलं. बायकोलाही अमोशा मिळाली नाही. त्याच्या दैन्यावस्थेचं वर्णन यात आहे.

‘ह्या मातयेचो लळो’ ही मालवणी बोलीची कथा सरिता पवार यांनी लिहिलीय. जमिनीच्या कामासाठी पम्याला त्याची आई बोलावून घेते. सकाळी आपणच रुजवलेली, जोपासलेली झाडं-पेडं, त्यांची हिरवाई बघून पम्या हरखून जातो. कामासाठी कणकवलीला जाताना त्याला वड, पिंपळ, चिंचेची झाडे आठवतात. ती रस्ता रुंदीकरणात पाडलेली असतात. हा विकास की विध्वंस? पम्याच्या मनात येतं. परतल्यावर घराभोवतीची बाग- नारळी, पोफळी, वेगवेगळ्या फळांची झाडं त्याच्या मनाला आनंद देतात. कणकवली, सिंधुदुर्ग या प्रदेशातील निसर्गाचं मोठं सुरेख वर्णन यात आहे, तसेच माय-लेकरातील संवादही मोठे चटपटीत आणि वाचनीय आहेत. शेवटी पम्या मुंबईची एका चाळीतली भाड्याची खोली सोडून गावी परतायचे ठरवतो, हे मोठ्या सूचकतेने लेखिकेने सांगितले आहे.

‘लाखीपुनी’ ही अहिराणी बोलीतील कथा लतिका चौधरी यांनी लिहिलेली आहे. लाखीपुनी म्हणजे राखी पौर्णिमा. गंगू शेतात निंदताना (खुरपणी ) गाणी (लोकगीतं) म्हणते. गाणी म्हणताना तिला भावाची आठवण येते. भाऊ मोठा झालाय बंगला, गाडी… त्या धुंदीत बहिणीला विसरला, तिला वाटतं. राखी बांधायला भाऊ नाही, ती कष्टी होते. शानूर, तिची मैत्रीण. दोघी एकत्र काम करणार्‍या. बहिणीसारख्याच. शानूर आपल्या नवर्‍याला सालीमला इशारा करते. तोही शेतात कामाला आलेला असतो. शानूर त्याच्या कानात काही-बाही सांगते. ती गंगूला म्हणते, ‘गंगू मेरी बहेना, यह तेरा धरमका मुहबोला भाई. ले लाखी बांध ले. भाई की याद आ रही है ना?’ गंगू काय करावं, या विचारात पडते. तशी ती म्हणते, ‘जात, रंग, धर्म, भेद इसरी मानवता धर्म देखानी नजर हाऊ सण देस. इतली ताकद या भाऊ बहिननी लाखी बांधनमा शे. ‘ मग गंगूने हसत हसत सालीमला राखी बांधली. हसत हसत दोन अश्रू गंगूच्या गालावर ओघळले. शानूरही खूश झाली. इतक्यात फटफटीचा आवाज आला. कोर्‍या फटफटीवरून गंगूचा भाऊ आला. ‘गंगूताई लाखी भांद. ‘ खिशातून राखी काढत तो म्हणतो, ‘बैन, नोकरी, पैसा, सवसारना लोभमा दूर र्‍हायाणू, पण नातागोताशिवाय जगणं म्हंजी जगनं नै हाई समजनं नी उनू भेटाले लाखीपुनीनं निमित्त देखी. ’ एकूण काय, गोड शेवट. भाषाही मोठी मधुर आहे. त्यावर हिन्दी आणि गुजराथीचाही प्रभाव जाणवतो. भाऊ-बहीण उराउरी भेटतात. गंगू राखी बांधते आणि नंतर निंदणीच्या आपल्या कामाला लागते. काम करता करता गाते,

‘आठवला भाऊ परदेशीचा बेईमान, लाखीपुनीले आला चोयी लुगड घेवून मानियेला भाऊ जातीचा मुसलमान, सख्ख्या भावापरीस त्याचं आहे ग इमान बहिणीला भाऊ एकतरी ग असावा, पावल्याचा खण, एक रातीचा इसावा.’

‘बंधे मूठ की ताकद’ या पोवारी बोली भाषेतील कथेत लेखक गुलाब बिसेन यांनी एकतेचे महत्त्व आणि त्यामुळे मिळणारे यश अधोरेखित केले आहे. वैनगंगेच्या खोर्‍यातील सितेपार गावात घडलेली कथा. आमदार फंडातून गावातील मुख्य रस्ता सिमेंटचा करायचे ठरते. रस्ता होतो. आमदारांच्या हस्ते उद्घाटन होते आणि महिन्याच्या आत त्यात घातलेल्या सळ्या बाहेर येऊ लागतात. गावातील ‘युवा-शक्ती’ नावाचा समूह, सरपंच, आमदार, ठेकेदारांना जाब विचारतात. पण ते दाद देत नाहीत. आमदार उडवा-उडवीची उत्तरे देतो. सरपंच ‘युवा-शक्ती’त फूट पाडण्याचा प्रयत्न करतो. पण ते शक्य होत नाही. त्यांना पोलिसांचा धाक दाखवतो. पण ही बहाद्दर मुले घाबरत नाहीत. पेपर, फेसबुक, ट्विटर या माध्यमांचा उपयोग करून बातमीचा प्रसार करतात. मुख्यमंत्र्यांना ई-मेल करतात. झाल्या प्रकाराची चौकशी होते. दोषी ठेकेदारावर कारवाई होते आणि ‘बंधे मूठक् ताकदको दर्शन पूर गावाला भयेव. ’ याही बोलीवर हिन्दी आणि गुजराथीचाही प्रभाव जाणवतो.

‘इंद्रधनुष्य नी एकलव्य धनुष्य ‘ या पावरा बोलीतील कथेत संतोष पावरा हे लेखक शेवटी म्हणतात, ‘लाखो आये द्रोनचार्य, समय अभी डगमगायेगा नाही. नया एकलव्य आ गया हई, दान अंगठे का अभ होगा नही!’ ते असं का म्हणाले, कथा वाचूनच समजावून घ्यायला हवं.

या संग्रहातल्या ‘आठवण’ – माणदेशी बोली- डॉ. कृष्णा इंगोले; ‘उजाले की ईद’- दख्खनी; उमाळा – कोल्हापुरी – सचीन पाटील; आशा अनेक उल्लेखनीय कथा आहेत. खरं तर सगळ्याच २२ कथा वाचनीय आहेत. त्या प्रत्यक्ष वाचूनच त्याची गोडी, नादमाधुर्य, लय अनुभवायला हवी.

यंदा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय. भाषा संपन्न व्हायची असेल, तर तिच्या बोलीही समृद्ध, संपन्न व्हायला हव्या. त्यांचा विकास, प्रचार, प्रसार व्हायला हवा. ‘मायबोली रंग कथांचे’ हे पुस्तक त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. या प्रयत्नाची दखल घेऊन की काय, संपादक सचिन वसंत पाटील यांना नुकताच ‘रावसाहेब पाटील साहित्य पुरस्कार ‘ सुप्रसिद्ध कादंबरीकार श्री. सुरेन्द्र रावसाहेब पाटील यांनी प्रदान केला आहे.

परिचय –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “बदलत्या विश्वरचनेत वेध विकसित भारताचा” – लेखक – डॉ. शैलेंद्र देवळाणकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “बदलत्या विश्वरचनेत वेध विकसित भारताचा” – लेखक – डॉ. शैलेंद्र देवळाणकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक: बदलत्या विश्वरचनेत वेध विकसित भारताचा

लेखक: डॉ. शैलेंद्र देवळाणकर (सुप्रसिद्ध परराष्ट्र धोरण विश्लेषक)

पृष्ठे: ३७६

मूल्य: ४९९₹ 

परराष्ट्र धोरण या विषयाशी सामान्य माणसाचा संबंध काय, असं बहुतेकांना वाटत असतं. ‘बटरफ्लाय इफेक्ट’ अशी एक जीवशास्त्रीय संज्ञा आहे; त्यानुसार भूमध्यसागरी प्रदेशात कुठेतरी एखाद्या फुलपाखराने आपले पंख फडफडवले की, पर्यावरणावर त्याचे दूरगामी परिणाम संभवतात. परराष्ट्र धोरण हा विषय अगदी असाच आहे. दूरवर दिल्लीत बसून सरकार जी ध्येयधोरणे ठरवतं त्याचा परिणाम गल्लीत राहणाऱ्या माणसांवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे होतच असतो.

शीतयुद्धोत्तर काळात जगाच्या पटलावर नव्या आर्थिक व राजकीय महासत्ता उदयास येत आहेत. जागतिक आणि ऐतिहासिक अंतर्वळणे बदलून टाकणाऱ्या घटना जगभरात घडत आहेत. या सगळ्यांत भारत कुठे आहे? आज ‘विश्वबंधू’ म्हणून आपलं परराष्ट्र धोरण राबवणारा भारत महासत्ता बनू शकेल का? जागतिक दहशतवाद, अंतर्गत सुरक्षा, तेलाचे राजकारण आणि विकसित भारताची बलस्थाने आणि आव्हाने या सगळ्यांचा ताळेबंद एका तज्ज्ञाच्या लेखणीतून.

भारताचे पूर्वीचे व आजचे परराष्ट्र धोरण, त्या अनुषंगाने भारताचा आर्थिक व सांस्कृतिक राजनय, विविध आंतरराष्ट्रीय घडामोडी या सगळ्यांचा ऊहापोह प्रसिद्ध परराष्ट्र धोरण विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी या पुस्तकात आपल्या अभ्यासपूर्ण आणि विश्लेषक शैलीत केला आहे.

भारताच्या स्वातंत्र्याची लवकरच शतकपूर्ती होईल. या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात आपण विकसनशील भारताला विकसित भारत बनविण्याचं व्यापक उद्दिष्ट ठेवलं आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी आपण कोणत्या क्षेत्रांत आमूलाग्र बदल करण्याची आणि त्यांच्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, हे प्रामुख्याने डॉ. देवळाणकर आपल्याला सांगतात.

या पुस्तकाची सहा गटात विभागणी केली आहे.

गट 1 

विकसित भारताचे आधारस्तंभ

गट 2 

परराष्ट्र धोरण — वर्तमानाला कोणते तोरण?

गट 3

भारतापुढील आव्हाने 

गट 4

जागतिक राजकारणातल्या सोंगट्या

गट 5

विकासाच्या क्षितिजांकडे वाटचाल (राष्ट्रीय पातळीवर)

गट 6

विकासाच्या क्षितिजांकडे वाटचाल;(आंतरराष्ट्रीय स्तरावर)

विविध स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि परराष्ट्र धोरण यांचे अभ्यासक, पत्रकार, प्राध्यापक आणि हा विषय समजून घेण्यास उत्सुक असणाऱ्या प्रत्येक नागरिकास हा ग्रंथ एक उत्तम मार्गदर्शक ठरेल.

लेखक परिचय : डॉ. शैलेंद्र देवळाणकर

तीन दशकांपासून परराष्ट्र धोरण आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचे संशोधक आणि विश्लेषक. या विषयातील तज्ज्ञ विश्लेषक म्हणून डॉ. शैलेंद्र देवळाणकर आपल्याला सुपरिचित आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे आणि ते यशवंतराव चव्हाण सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. पुढे त्यांनी एम. फिल नंतर दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी इथून ‘आंतरराष्ट्रीय संबंध आणि परराष्ट्र धोरण’ या विषयावर पीएच. डी. केलेली असून गेली अनेक वर्षे ते या विषयावरील संशोधन आणि लेखन करत आहेत. यापूर्वी या विषयावरील प्रकाशित झालेली त्यांची चौदा पुस्तके स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना, पत्रकारांना, संपादकांना मोलाचे मार्गदर्शन करणारी ठरली आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींवर ते विविध माध्यमातून सखोल विश्लेषणाद्वारे मार्गदर्शन करत आलेले आहेत. गेल्या दोन दशकांपासून ते संशोधक, शिक्षक, लेखक आणि प्रशासक अशा महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत आहेत.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “ऐवज विचारांचा” – प्रा. स. ह. देशपांडे निवडक लेखसंग्रह ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “ऐवज विचारांचा” – प्रा. स. ह. देशपांडे निवडक लेखसंग्रह ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक :  ऐवज विचारांचा “.

स. ह. देशपांडे निवडक लेखसंग्रह

पृष्ठे : ४३९

मूल्य : ५००₹ 

प्रा. स. ह. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष सरत असताना त्यांच्या निवडक लेखांचा संग्रह ‘ऐवज विचारांचा’ प्रकाशित होत आहे. प्राध्यापक देशपांडे यांनी पाच दशकांहूनही अधिक काळ विपुल लेखन केले व महाराष्ट्राच्या विचार-विश्वावर स्वतःचा एक विशिष्ट ठसा उमटवला. ‘राष्ट्रवाद’ या विषयाचे त्यांचे लिखाण हे अनेक मान्यवरांकडून व व्यासपीठांवरून चर्चिले गेले.

प्रस्तुत पुस्तकात स. हं. च्या लेखांची विभागणी ‘राष्ट्रवाद’, ‘सामाजिक आणि आर्थिक’, ‘व्यक्तिचित्रे’ आणि ‘संकीर्ण’ या चार प्रकारांत केली आहे. या सर्व लेखांतून प्रा. देशपांडे यांची स्वतंत्र लेखनशैली, विचारांतील सखोलता व सूक्ष्मता, तसेच तर्कशुद्ध व चिरेबंद मांडणी या बाबी वाचकाला सातत्याने जाणवत राहतील. आजही ताजे वाटणारे त्यांचे विचारगर्भ लेखन पुढील पिढ्यांनाही मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास वाटतो.

ग्रंथात चार विभाग केले केले आहेत.

विभाग एक : राष्ट्रवाद

या विभागात आठ लेख आहेत. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल, कार्यपद्धतीबद्दल स. ह. देशपांडे यांना काय वाटतं होते, ते मांडण्यात आले आहे.

विभाग दोन : समाजकारण व अर्थकारण

या विभागात पाच लेख आहेत. यामध्ये चार लेख विविध विषयांवर आहेत.

विभाग तीन : व्यक्तिचित्रे

या विभागात सहा लेख आहेत. यामध्ये पाच जणांचे व्यक्तिचित्रण आहे.

विभाग चार : संकीर्ण

या विभागात सात लेख आहेत. यामध्ये स. ह. देशपांडे यांच्याबद्दल लिहिलेले लेख आहेत.

स. ह. देशपांडे यांचे सुपुत्र डॉ. चंद्रहास देशपांडे यांनी ‘सलाम, ‘त्या’ ध्यासाला, ‘त्या’ अभ्यासाला… !’ या लेखात आपल्या वडिलांच्या पैलूंबद्दल लिहिले आहे. त्यातील काही परिच्छेद इथे देत आहे. ते लिहितात- ‘सल्लामसलत, चर्चा, विचारमंथन, मतप्रवाहांची देवाण-घेवाण, या सध्याच्या जगात (दुर्दैवाने) होत चाललेल्या शिक्षण पद्धती हा तर बाबांच्या शिक्षकी प्रकृतीचा आणि प्रवृत्तीचा आत्माच होय. बऱ्याच वर्षांपूर्वी पार्ल्याच्या घरी नियमितपणे एक चर्चासत्र बाबा मुद्दाम घडवून आणीत. अनेक विषयांवर त्यात खुली, खेळीमेळीच्या वातावरणातील, पण गंभीर चर्चा व्हायची, वादाच्या फैरीही झडायच्या. ’

‘स्वतःच्या मतांबद्दल आग्रही, नव्हे क्वचितप्रसंगी अत्याग्रही राहूनही, वैचारिक विश्वात वावरताना मात्र बाबा सदैव विचारस्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्तेच होते. उदाहरणार्थ- जेव्हा बाबांच्याच एखाद्या लेखावर वा पुस्तकावर चर्चा असायची, तेव्हा आपल्या प्रतिपादनाच्या विरुद्ध भाष्य करणाऱ्या अभ्यासू व्यक्तींना आवर्जून बोलवायला बाबा आयोजकांना सांगत असत; पण त्याबद्दल स्वतःही प्रयत्नशील असतं. ‘

‘एक व्यक्ती म्हणून बाबांकडे बघताना मला जर कायम जाणवणारी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे हा एक ‘अस्वस्थ आत्मा’ होता. अनेक प्रकारच्या संवेदना असूनही बाबांना नेहमी जाणवत असे वा भिडत असे, ती एखादी सामाजिक वेदना. भोवतालच्या परिस्थितीत फार झपाट्याने सामाजिक- आर्थिक व मुख्यतः नैतिक अधःपात होत आहेत, मूल्यांचा पदोपदी ऱ्हास होत आहे, आपल्या देशाची अशी आयडेंटिटीच जणू वेशीवर टांगली आहे की काय, या व इतर अनेक समस्यांनी बाबा कायमच अस्वस्थ असत, त्यासाठी कायम एखाद्या विधायक मार्गाच्या शोधात असत. मात्र, आपले काम हे हातात मशाल घेऊन जाणाऱ्याचे नसून, वैचारिक पातळीवरून समाजाला काही मार्गदर्शन करण्याचे आहे, याची त्यांना पुरेपूर जाणीव होती. तत्त्वांशी ते तडजोड खपवून घेत नसत व आपल्या डोळ्यांदेखत कोणावरही अन्याय झालेला त्यांना सहनही होत नसे. त्यासाठी निर्ढावलेल्या सरकारी अधिकाऱ्यापासून, उद्धट बसवाहकापर्यंत कोणाशीही भांडायला ते मागेपुढे पाहात नसत. शारीरिक जोखीम पत्करूनही त्यांनी अनेक प्रसंगांना धैर्याने तोंड दिले आहे. ‘

‘आज मागे वळून पाहताना बाबांच्या वैविध्यपूर्ण, लालित्यपूर्ण तसेच सखोल लेखनाचा काहीसा अचंबा वाटतो. एकीकडे भोवतालच्या सामाजिक परिस्थितीचे निरीक्षण आहे, तर ग्रामीण आर्थिक वास्तवाचे (भावुक न होता) परीक्षण आहे; मान्यताप्राप्त व्यक्तींची/विभूतींचीही डोळस चिकित्सा आहे, तसेच राष्ट्रवादासारख्या स्फोटक विषयाची अभ्यासपूर्ण व अभिनिवेशरहित मीमांसाही आहे. रसग्रहण आहे, तेही मर्मग्राही आहे. प्रतिवाद करताना कोठेही आत्मप्रौढी नाही, अहंकार नाही. केवळ आणि केवळ मतभेद व्यक्त करणे आहे (जेथे वैयक्तिक टीका झाली, तेथे मात्र त्याचाही समाचार घेतला गेला आहे). दर्जा, पातळी कधीही घसरलेली नाही, ना शब्दांवरचा ताबा कधी सुटल्याचा प्रसंग… ‘

– – – वैचारिक, तर्कशुद्ध वाचनाची आवड असणाऱ्यांनी हा विचारांचा ऐवजअवश्य वाचावा. यामुळे आपल्या मनाची वैचारिकघुसळण मात्र नक्कीच होईल.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “माइंडफुलनेस” – लेखक – डॉ. राजेंद्र बर्वे ☆ प्रस्तुती – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “माइंडफुलनेस” – लेखक – डॉ. राजेंद्र बर्वे ☆ प्रस्तुती – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक :  माइंडफुलनेस

– – वर्तमान क्षणात जगण्यासाठीची ‘पूर्णभान’ संकल्पना

लेखक: डॉ. राजेंद्र बर्वे 

पृष्ठ: १३७

मूल्य: २००₹ 

सोशल मीडिया आणि समाजातील वाढती झुंडशाही, हव्यासांचे इमले, ताणतणावांची चढती भाजणी, यांमुळे मनाच्या एकाग्रतेवर, स्थिरतेवर आणि स्वतःच्या आत्मविश्वासावर परिणाम होत आहे. आज प्रत्येकाच्या मनाला गरज आहे ती पूर्णभानाने जगण्याची, अर्थात माइंडफुलनेसची !

पूर्णभान म्हणजे अस्तित्त्वाची वर्तमानातील लख्ख जाणीव… पूर्वग्रह आणि निवाडा छेदून जाणवणारी उत्साही व लक्षपूर्वक जोपासलेली मनोवृत्ती… सभोवतालासकट स्वतःचा केलेला बिनशर्त स्वीकार. अशी जागती जाणीव स्वतःमध्ये निर्माण करायची तर, त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आणि नेटकं मार्गदर्शन घ्यावं लागतं. हे साध्य करण्यासाठी गप्पाटप्पा, व्यक्तिगत समायोजन, प्रश्नोत्तरं, कविता-गाणी आणि अशा आनंदयात्रेतून पूर्णभानाचं प्रशिक्षण देत आहेत सुगत आचार्य डॉ. राजेंद्र बर्वे.

आता आधुनिक काळातील मानसोपचारांना वर्तमानकाळाचे वेध लागले जे काही घडवायचं ते ‘इथेच आणि आताच’ अशा पद्धतीने करायला हवेत असे विचार रुजले.

इंग्रजीत या संकल्पनेला ‘हियर अँड नाऊ’ असं संबोधतात. त्यानंतर १९७९ मध्ये जॉन कब्याट झीन यांनी हे आव्हान स्वीकारलं, मानसिक ताण-तणावाची तीव्रता कमी करण्यासाठी त्यांनी ‘माइंडफुलनेस ‘ प्रणालीचा वापर करून त्यावर शोधनिबंध लिहिला आणि मानसशास्त्रामध्ये त्याला सार्वमत मिळालं. हा बदल ऐतिहासिक ठरला. कारण ‘इथे आणि आता’ या संकल्पनेला समर्पक आयाम लाभला.

झीन स्वतः विपासनेचे विद्वान अभ्यासक, अचूक शब्दांत त्यांनी माइंडफुलनेसच्या संकल्पनेची व्याख्या मांडली. वर्तमानावर हेतुपूर्ण लक्ष्य केंद्रित करून जे मनात आणि आसमंतात घडतं आहे त्याचा विनाअट आणि विना निवाड्याने स्वीकार करणं म्हणजे माइंडफुलनेस ! 

झीन यांनी वर्तमानकाळाचा असा अचूक वेध घेतला. यावर अत्यंत काटेकोर संशोधन केलं. पुढे त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली आणि इतिहास घडला.

आत्ताचा क्षण आनंदाने आणि समस्यामुक्तपणे जगण्याचा मंत्र देणारं पुस्तक माइंडफुलनेस.

लेखक परिचय

डॉ राजेंद्र बर्वे यांनी एल. टी. एम. मेडिकल कॉलेज, सायन मुंबई येथून पहिल्या क्रमांकासह एम. डी. ची पदवी प्राप्त केलीगोडा मेडिटेशन सेंटर, कोलंबो, श्रीलंका येथून भन्ते ओलाआनंदा यांच्या हस्ते त्यांना ‘माइंडफुलनेस टीचर’ (सुगत आचार्य) ही पदवी प्रदान करण्यात आली. पाश्चात्त्य वैद्यकीय विज्ञान पटक आणि पौर्वात्य तत्त्वज्ञान यांचा सुयोग्य संगम साधून माइंडफुलनेस अर्थात पूर्णभान या विषयावर त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्यानं दिली आहेत. गेल्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीत देश-विदेशातील विविध कार्यशाळा आणि परिषदांमधून त्यांनी ‘न्यूरो सायन्स’, ‘मानसिक आरोग्य’ आणि ‘समग्र आरोग्य विचार‘ या विषयांवर तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शन केलं आहे. कतार इथे एका मोठ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी माइंड लनेस या विषयावर त्यांनी कार्यशाळा घेतली असून, लंडन येथील एका खासगी वाहिनीसाठी माइंडफुलनेस विषयावर मुलाखतही दिली आहे.

प्रस्तुती : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “गंध ओला मोगऱ्याचा” (गझलसंग्रह) – कवी : श्री. विनायक कुलकर्णी ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “गंध ओला मोगऱ्याचा” (गझलसंग्रह) – कवी : श्री. विनायक कुलकर्णी ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

पुस्तक :  गंध ओला मोगऱ्याचा (गझलसंग्रह)

कवी : श्री. विनायक कुलकर्णी मो. 8600081092

प्रकाशक: न्यू अथर्व पब्लिकेशन, इचलकरंजी

मूल्य : रु. १४०/-

सांगली येथील गझलकार कवी श्री. विनायक कुलकर्णी यांचा ‘ गंध ओला मोग-याचा ‘ हा गझल संग्रह मोग-याच्या फुलाप्रमाणेच सर्वांगाने बहरून आला आहे. या संग्रहात एकूण अठ्ठावन गझला असून त्यात निसर्ग, प्रेम, नैराश्य, विरह अशा सर्व भावनांवरील गझला आहेत. पण गझल फक्त एवढ्या विषयांपुरतीच मर्यादित नसून तिने सामाजिक, राजकीय वास्तव देखील दुर्लक्षिलेले नाही हे दाखवून देणा-या गझला या संग्रहात वाचायला मिळतात. त्यामुळे गझल म्हणजे फक्त प्रेम आणि विरह नव्हे तर सामाजिक भान व्यक्त करण्याचेही माध्यम आहे हे श्री कुलकर्णी यांच्या संग्रहातून स्पष्ट होते. त्यामुळे सर्वच गझलांचा किंवा गझल काव्य प्रकाराविषयी लिहिण्यापेक्षा श्री. कुलकर्णी यांच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे काही शेर या ठिकाणी समजून घ्यावेसे वाटतात.

स्वार्थ कसा साधावा हे शिकवावे लागत नाही. पण स्वार्थ साधत असताना तो किती टोकाचा असावा याचा विचार मात्र व्हायलाच हवा. पण आजची परिस्थिती काय आहे ? कालची भूमिका आज नाही, कालचे विचार आज नाहीत, कालचा मित्र आज मित्र नसेल अशीच अवस्था समाजात सर्वत्र दिसते आहे. त्याचे नेमके रुप कविने या शेरातून केले आहे.

” पहात असतो अवतीभवती माणुसकीचे रंग नवे

स्वार्थासाठी कसे बदलती रोजरोजचे ढंग नवे “

काळाबरोबर बदलले पाहिजे. पण हा बदल स्विकारताना आपण सभ्य समाजात राहतो हे ही विसरता कामा नये. आधुनिकतेचा स्विकार करताना योग्य अयोग्य काय याचाही विचार व्हायला हवा. या शेरामध्ये कवीने पोषाखातील होत जाणा-या बदलाबद्दल सुनावले आहे. भोक पाडलेले कपडे ही फॅशन होऊ शकते का ? तंग कपडे आरोग्यासाठी तरी योग्य आहेत का ? आजच्या फॅशन व अंधानुकरणाच्या जमान्यात हे फारसे कुणाला पटणार नाही. पण स्वतःच्या मनाला जे पटत नाही ते बोलून दाखवणे हा कविचा बाणा आहे.

“झाकत होते देह आपले पुरुष असो वा ती नारी

पोषाखाची झाली चाळण आता कपडे तंग नवे “

स्वार्थ आणि फक्त व्यवहारवाद यामुळे आपली अशी समजूत झाली आहे की पैसा फेकला की काहीही विकत घेता येते. अगदी माणूससुद्धा! त्यामुळे कविला असा प्रश्न पडतो की स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहून इमान राखणारा माणूस असेल तरी का ? म्हणजे बजबजपुरी एवढी माजली आहे की माणसाचा चांगुलपणावरचा विश्वासच उडायला लागला आहे. माणूस प्रामाणिक, तत्त्वनिष्ठ असू शकतो यावरचा विश्वास कमी होत चालला आहे.

“प्रसंग येतो पुढे आपल्या तसाच आपण विचार करतो

असतिल का हो अशी माणसे इमान ज्यांचे मळले नाही “

बदलत्या पिढीबरोबर विचारही बदलतात. विचारातील हा बदल माणसाच्या प्रगतीला पोषक असेल तर अवश्य स्वीकारावा. पण आज जुन्याकडे पाठ फिरवून फक्त ‘ नवे ते सोने ‘ ही वृत्ती वाढीस लागली आहे. त्यामुळे संस्कार करणे, करुन घेणे, झालेले संस्कार टिकवणे हे कालबाह्य वाटू लागले आहे. याचा परिणाम म्हणूनच नीतीमत्तेचा -हास होत चालला आहे. सुसंस्कृत नसलेल्याला माणूस तरी कसे म्हणावे. राक्षसाच्या मनातील वासना आणि वृत्ती आता माणसात दिसू लागली आहे.

” संस्कार आणि नीती गेली निघून आता

ओळीत राक्षसांच्या बसतात लोक सारे “

बदलत्या सामाजिक आणि राजकीय वस्तुस्थितीवर कवीचे बारीक लक्ष आहे. निवडणुकीच्या आधीची आणि नंतरची गटबाजी आता संसर्गजन्य झाली आहे असे त्याला वाटते. कारण ती एका गटापुरती मर्यादित राहिलेली नाही. घोडेबाजार हा नित्याचाच होऊन बसला आहे. सत्ता आणि संपत्तीच्या मोहापायी तत्वशून्य तडजोडींनी कमाल केली आहे.

” गटबाजीच्या संसर्गाने कमाल भलती केली

काही इकडे आले घोडे काही तिकडे गेले “

क्रियेवीण वाचाळता हा आजच्या काळचा मंत्रच होऊन बसला आहे. समाजासाठी काय करावे, देशासाठी काय करावे हे सांगणे फार सोपे असते. समाजाचे कल्याण करण्याच्या गप्पा या निवडणूक होण्यापुरत्याच असतात. कारण गोड बोलून, आश्वासनांचा पाऊस पाडून निवडून येणे एवढेच त्यांचे ध्येय असते. त्यामुळे

” कोणी देतो भाषण फुसके कल्याणाचे

त्याचा तुमच्या मतदानावर डल्ला आहे “

असे कविचे निरीक्षण आहे.

समाजाच्या हितासाठी केलेली चळवळ ही किती वरवरची व दिखाऊ असते याचा समाचारही कविने घेतला आहे. त्यासाठी कवी पाणीप्रश्नाकडे लक्ष वेधत आहे. पाण्याचे नियोजन न करता होणारा पाण्याचा वापर हा पाणीप्रश्न गंभीर होण्याचे मुख्य कारण आहे. पण त्याकडे लक्ष न देता पाण्याची उधळपट्टी चालुच आहे आणि दुसरीकडे पाणी वाचवा म्हणून चळवळही चालू आहे. हा विरोधाभास कविने दाखवून दिला आहे.

“खर्चुन गेले जल सारे या जमिनी मधले

भाषणबाजी मधून नकली चळवळ आहे “

परंतु या प्रश्नांकडे, समस्यांकडे, समाजातील दोषांकडे एक कवी म्हणून कविला दुर्लक्ष करता येत नाही. कारण समाजात सुधारणा होऊन त्याची प्रगती होण्यासाठी कुणालातरी लढावे लागेल हे त्याला माहित आहे. म्हणून कवी म्हणतो

” नाते माझे अखंड आहे संघर्षाशी 

धारिष्टाचे शस्त्र लढाया मीच बनवतो “

या सर्व गुणदोषांसकट कवी समाजावर प्रेम करतो. म्हणून तो म्हणतो

” झाली सकाळ आहे गाऊ नवीन गाणे

ती रात्र क्लेशदायी पुरती सरुन गेली. “

कविच्या इच्छेप्रमाणे लवकरच क्लेशदायी रात्र संपावी आणि नव्या युगाची गाणी गाण्यासाठी भाग्याची सकाळ उजाडावी एवढीच सदिच्छा !

पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “फिनिक्सच्या राखेतून उठला मोर” (कथासंग्रह) – लेखक : श्री जयंत पवार ☆ परिचय – श्री प्रसाद साळुंखे ☆

श्री प्रसाद साळुंखे  

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “फिनिक्सच्या राखेतून उठला मोर” (कथासंग्रह) – लेखक : श्री जयंत पवार ☆ परिचय – श्री प्रसाद साळुंखे  ☆

पुस्तक : फिनिक्सच्या राखेतून उठला मोर (कथासंग्रह)

लेखक – श्री जयंत पवार

प्रकाशन – लोकवाङ्मय गृह

मागे एक एकांकिका लिहित होतो. चाळीत घडणारी कथा होती. आणि त्याला गिरणी संपाचा चुटपुटता स्पर्श होता. तेव्हा वाचन वाढव असा सल्ला देणाऱ्या मित्रांमध्ये ‘ फिनिक्सच्या राखेतून उठला मोर ‘ या जयंत पवारांच्या कथासंग्रहाचं नाव वारंवार येत होतं. मी मात्र आपलं घोडं दामटवून अधाशासारखी एकांकिका खरडली. मित्राला पहिला खर्डा दाखवणार तोपर्यंत त्याचा अपघातात दुर्दैवी अंत झाला, मग इतर कोणाला द्यायची नाही असं ठरवलं.

हे सगळ पटपट उफाळून यायचं कारण म्हणजे त्या दिवशी किताबखानाला हा कथासंग्रह पाहिला. डोक्यात हे सारं घोळत असताना आपसूकच हात या कथासंग्रहाकडे गेले आणि मी तो पदरी पाडून घेतला. जयंत पवार हे नाव नाट्यरसिकांच्या परिचयाचं. पण कथासंग्रह वाचल्यावर आपल्याला कथाकार म्हणूनही ते तितकेच भावतात. म्हणजे नाट्यसंहिताच थोडी उणी अधिक वाक्य टाकून कथेचं लेबल लावून पेश केलीय असे नाही. कथा रचनेचा समर्थ वापर जयंत पवार यांनी केलेला आढळतो. कथाकार म्हणून त्यांची कथाकथनाची शैली अफलातून आहे.

पुस्तकाची पहिली आवृत्ती जुलै २०१० ला प्रकाशित झाली. या कथासंग्रहात २००२ पासून २००९ पर्यंतच्या जयंत पवारांच्या वेगवेगळ्या अंकात प्रसिद्ध झालेल्या सात कथा आहेत. यातूनच समजते की कथालेखन अभ्यासूपणे आणि गांभीर्याने केलेलं आहे. केवळ दिवाळी अंकांच्या आग्रहाखातर केलेलं हे लिखाण नाही. तसंही असं लिखाण आतून स्फुरावं लागतं. अनुभवाची सरमिसळ त्यात असते, वाचनाचा व्यासंग असतो, मग त्यावर कोणाचाही आग्रह चालत नाही अगदी स्वतःचाही. तर अशा फार गडबडीने न लिहिता संवेदना वेचत, आयुष्याच्या अनुभवांच्या, कल्पनांच्या हलक्या धगीवर निवांत मुरू देत बनलेल्या ताज्या कसदार कथा आहेत.

‘टेंगशेंच्या स्वप्नातील ट्रेन’ या पहिल्या कथेपासून हा प्रवास सुरू होतो. या कथेत जगण्यातलं बोटचेपं धोरण, व्यवस्थेच्या दडपणात अंकुरलेला आणि फैलावलेला मध्यमवर्गी षंढपणा आपल्याला दिसतो. ज्यावर कथा, ललित काही लिहिलं किंवा आजच्या भाषेत फेसबुकवर किंवा अन्य सामाजिक प्रसार माध्यमावर माफक हळहळलो म्हणजे “मी त्यांचा भाग नाहीए हं” हा भंपकपणा अधोरेखित होतो.

नंतर आपण ‘साशे भात्तर रुपयांचा सवाल अर्थात युद्ध आमचे सुरू! ‘ कथा वाचतो. ज्यात एका हिशोबाच्या गैरसमजामुळे दोन समाज एकमेकांना हिशोबात ठेवण्याचं प्रयत्न करतात, पण त्याच्या या कुरघोडीत कोणाचा फायनल हिसाब होतो हे वाचणं रंजक वाटतं.

नंतर ‘ फिनिक्सच्या राखेतून उठला मोर ‘ ही कथा आपण वाचतो ही कथा गिरणी संपावर बेतली आहे. ज्यात गिरणी कामगारांच्या कुटुंबावर भाष्य आहे. फिनिक्स मॉलचा झगमगाट यांच्या आयुष्यातला अंधार घालवू शकणार आहे का? तिथला एसी भूतकाळातील जखमांवर थंडावा देईल का? तो चकचकीतपणा स्वप्नांवरची वास्तववादी धूळ फुंकेल का? अशा कोंदटवाण्या प्रश्नांवर आपल्याला विचार करायला ही कथा भाग पाडते. भूतकाळ आणि वर्तमानकाळ अशी कथा सफाईने फिरत राहतो त्यामुळे पात्रपरिचय, पात्राचे निरनिराळे पैलू आपल्याला पाहता येतात.

‘जन्म एक व्याधी’ नावाची एक कथा आहे. ज्यात कथेचा निवेदक घरातले छोटे मोठे कलह काही त्याच्या डोळ्यासमोर घडलेले तर काही घरातल्यांकडून ऐकलेले सांगत राहतो. हे सांगणं फार नाट्यपूर्ण आहे. एखादा सुधारणाप्रिय माणूस आपल्या चुकांवर मात करून सुधारु शकतो का? का त्याची भूतकाळाची लेबलं लोक आपल्या सोईसाठी वापरतात, असे बरेच विचार ही कथा वाचताना येतात.

मग पुढची गोष्ट म्हणजे ‘ चंदूच्या लग्नाची गोष्ट अर्थात सड्डम में टढ्ढुम ‘ ही माझी या कथा संग्रहातील सगळ्यात आवडती कथा. ही कथा खुसखुशीत आहे. कथानायक (? ) चंदू जवळपास मन जिंकून घेतो आहे. त्याच्या वात्रटपणाकडे आपण सुरुवातीला डोळेझाक करतो. पण कथा जसजशी पुढे सरकत जाते तसतसं आपलं मतपरिवर्तन होतं. आपण जवळपास चंदू होऊन जातो. एवढे गुंतून जातो की कपाळावरच्या आठ्या चंदूला ‘अरे नको करू’ असं बजावत राहतात. या कथेवर कोणी चित्रपट काढला तर धमाल होईल, म्हणजे कलाकारांची उत्तम भट्टी जमली तर फर्स्ट हाफ तरी अफलातून होईल.

नंतर सुरू होतो ‘एका रोमहर्षक लढ्याचा गाळीव इतिहास’ थेट पुन्हा गिरणी संपाची पाश्र्वभूमी. बाहेर गिरणी संपाचा लढा तर चाळीत चाळीतल्या संडासावर ताबा मिळवण्याच्या कुरघोड्या अशा दोन घटना आपण समांतर पाहतो. संपाच्या लढ्याचा वेदनादायी निकाल बहुतेकांना माहितीच आहे पण या चाळीतल्या दुसऱ्या तुंबळ युद्धाचं नेमकं काय होतं यासाठी ही कथा वाचावी लागेल.

सातवी म्हणजे अगदी शेवटची कथा म्हणजे

‘छटाकभर रात्र आणि तुकडा तुकडा चंद्र ‘ आयुष्याच्या छटाकभर रात्री ज्यांनी बारमध्ये घालवल्या त्यांना तुकड्या तुकड्यात दिसलेल्या एका चंद्राविषयी हे लिहिलं आहे. तीन कवी आणि एका गूढ कथा लेखकाच्या आसपास ही कथा फिरते. एकच गोष्ट त्यांना निरनिराळी दिसते, सत्याचा शोध घेत घेत अंतिम सत्य उरते ते म्हणजे मृत्यू. या कथेत नेमका निवेदक कोण याचा गल्लत होते आणि तळटीप वाचून तर गुंता अधिकच वाढतो. ही कथा वाचून मी प्रस्तावनेकडे वळलो काही तिरबागडं लिहिलं जाऊ नये म्हणून.

निखिलेश चित्रे यांची प्रस्तावना अत्यंत अभ्यासूपणे लिहिली आहे. आणि खरोखर वाचतांना किंवा वाचल्यानंतरही आपल्याला उमगलेल्या अर्थाचा पडताळा करण्यासाठी ही विस्तृत आणि मुद्देसूद प्रस्तावना कथेतल्या वास्तवाच्या भावनिक दाहावर फिरणारं हळुवार मोरपीस ठरतं.

सात कथांचे सात सूर वेगवेगळ्या संवेदनांना हात घालतात. पण सूरांना घट्ट पकडून ठेवलेल्या या कथा एका भन्नाट मैफलीचा आपल्याला आनंद देतात. या राखेतून उठलेल्या मोरपिसाऱ्यात आयुष्याच्या वेगवेगळ्या छटा दिसतात, ज्यामुळे कधी विचारांचं काळोखं मळभ दाटतं, तर कधी आतल्या पडझडीत काहीतरी संततधार चिंब कोसळत राहतं.

परिचय : श्री प्रसाद साळुंखे

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9664027127

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares