☆ पुस्तकांवरबोलू काही ☆ पुस्तक “बापू माझी आई” – मनुबहेन गांधी ☆ परिचय – श्री ओंकार कुंभार ☆
लेखिका : मनुबहेन गांधी
प्रकाशक : नवजीवन प्रकाशन
लांबी रुंदीला छोटेसे व पानेही 56 इतकेच व फक्त 15₹ किंमत असणारे नवजीवन प्रकाशनाचे हे पुस्तक तसे महत्वाचेच व आशयघन ही.
गांधींची नातेवाईक मनुबहेन गांधी यांचं ‘भावनगर समाचार’ मध्ये प्रकाशित झालेल्या डझनभर लेखांचे हे पुस्तक होय.
मनुबहेन यांचा हा लेख लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न. बापूजींच्यासोबत एका कठीण काळात नोआखली मध्ये राहण्याचा भाग्ययोग त्यांना लाभला. तत्संबंधीचा हा महत्वपूर्ण असा ऐतिहासिक दस्तऐवजच मानला पाहिजे.
बापूजींच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पदर यात उलगडताना आपणाला पहायला मिळतात. काही प्रसंगांमधील बापूजींचे वागणे कसे होते. व त्यांची वैचारिक पातळी किती उच्च दर्जाची होती ते या लेख संग्रहातून जाणवते. जसे मनुबहेन यांना नोआखलीतील शांततेच्या कामासाठी रात्री २ वा. उठवताना सांगितलेला महत्वाचा संदेश.
बापूजींचे सहकारी सतीशबाबू यांनी एक झोपडी तयार केली होती जीचे एक-एक भाग लहान मुलांनाही वाहून नेता येतील व कुठेही ती झोपडी वसवता येईल. जेणेकरून बापूजींना त्यानिमित्ताने या हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या कामात थोडी उसंतही मिळावी. परंतु, एकदा एका गावात ती झोपडी वापरल्यानंतर त्या गावातील भयंकर परिस्थिती पाहून आपणाला अशा झोपडीत ही राहण्याचा अधिकार नाही असे जाणून त्या झोपडी चे रुपांतर एका लहान इस्पितळात करण्यास सांगितले. असे अनेक प्रसंग आपणास वाचण्यासाठी मुळातूनच हे पुस्तक वाचायला हवे. धन्यवाद !
परिचय – श्री ओंकार कुंभार
श्रीशैल्य पार्क, हरिपूर सांगली.
मो.नं. 9921108879
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञाच्या निमित्ताने मी प्रस्तावनेसह एकूण सात भागांच्या पुस्तकांवर लिहित गेले. भागवत कथा ही कोटी सूर्याच्या तेजाएवढी आहे. मी त्यापुढे फक्त काजवा आहे. तरीही मी त्यावर लिहिण्याचे धाडस केले आहे. वाचकांनी ते गोड मानले असेल अशी अपेक्षा करते. आजच्या सातव्या दिवसाच्या पुस्तकावर लिहिताना मला खूप आनंद होतो आहे. या ज्ञानसागरातील एक बिंदू तरी मला वेचता आला, तो तुम्हासारख्या सुजाण वाचकांसमोर ठेवता आला. याचा तो आनंद आहे. यात काही संशोधन, पांडित्य प्रदर्शन अजिबातच अभिप्रेत नाही. संस्कृत भाषेचे थोडे फार ज्ञानही मला इथे उपयोगी पडले आहे.
या पुस्तकाच्या सुरुवातीस लेखकाने यानंतरच्या समाप्ती विषयी सांगितले आहे. ते असे– की सात दिवस सात पुस्तकांचे वाचन वा श्रवण करावे. रोजच शेवटी आरती करावी. त्यासाठी या भागाच्या शेवटच्या पानांवर लेखकाने संस्कृत व प्राकृत भाषेत भागवताची आरती दिली आहे. आठव्या दिवशी सामुदायिक रीत्या अठरा अध्याय गीता व विष्णुसहस्त्रनामाचे पठण करावे. महाप्रसाद करून हा सप्ताह संपवावा. असे लेखकाने स्पष्ट केले आहे.
या पुस्तकाची सुरुवात अकराव्या स्कंधाने होते. हा श्रीकृष्ण चरित्राचा उत्तरार्ध आहे. शुकाचार्य परीक्षिताला यादवांच्या विनाशाची कारणे सांगतात. प्रथम नारद व वसुदेव यांची भेट झाली. वसुदेवाला नारदांनी भागवत धर्माचे महत्त्व सांगितले आहे. भगवद् भक्तांचा श्रेष्ठ धर्म म्हणजे,
कायेन वाचा मनसेंन्द्रियैर्वा
बुद्ध्यात्मना वानुसृत् स्वभावात् |
करोति यद्यद् सकलं तदस्मै
नारायणेति समर्पयेत् तत् ||
असे नारदांनी सांगितले आहे. सर्व प्राणिमात्रात परमेश्वर आणि आपल्या आत्म्यात सर्व प्राणिमात्र आहेत. असे जो पाहतो तो खरा सर्वश्रेष्ठ भगवद्भक्त! असे भगवद् भक्ताचे लक्षण येथे दिले आहे.
भागवताचा हा कथा भाग म्हणजे केवळ गोष्टीरूप नाही तर येथे केवळ जीवनाचे तत्त्वज्ञानच महर्षी व्यासांनी सांगितले आहे. जीव, शरीर हेच आत्मा असे समजतो. कर्माची फळे भोगतो. हेही विशद केले आहे. मुनींनी सृष्टीच्या अंताची प्रक्रिया सांगितली आहे. शंभर वर्षे सतत अनावृष्टी होईल. नंतर सांवर्तक नावाचे मेघ शंभर वर्षे मुसळधार वर्षाव करतील. मग प्रलय होईल. पृथ्वीवरील सुखे लगेच नष्ट होणारी आहेत. भागवताच्या अभ्यासाने जीव तरुन जाऊ शकतो, इत्यादी तत्त्वज्ञान सांगितले आहे. शुकाचार्य सांगतात की ज्याच्यामुळे आपण जिवंत असतो, इंद्रिये हालचाल करतात, ती शक्ती म्हणजे परमात्मा !! चराचर सृष्टीतील भगवंताची पूजा कशी करावी हे पुढे सविस्तर सांगितले आहे.
यानंतर विष्णूंनी जे चोवीस अवतार घेतले त्यांचे थोडक्यात वर्णन आले आहे. पुढे चार युगातील पूजा पद्धती कशा कशा होत्या,त्या त्या देवतांचे वर्णन केले आहे. लाभाच्या दृष्टीने कलियुग श्रेष्ठ आहे. कारण केवळ भगवंताचे नामस्मरण, कीर्तन, श्रवण यानेच या युगात मोक्ष मिळतो. असे लेखक म्हणतात.
यानंतर ब्रह्मदेवासह सर्व देव ऋषीमुनी द्वारकेत येऊन कृष्णाला भेटतात. ब्रह्मदेव श्रीकृष्णाला परत वैकुंठाला यावे अशी प्रार्थना करतात. तेव्हा यादव कुलाचा विनाश झाल्यावर मगच मी वैकुंठाला येईन असे श्रीकृष्ण म्हणतात. उद्धव मात्र श्रीकृष्णाच्या सह वैकुंठास जाण्याची इच्छा व्यक्त करतो. तेव्हा कृष्ण उद्धवाला उपदेश करतात. हा उपदेश म्हणजे सुद्धा फक्त जीवनाचे तत्त्वज्ञानच आहे. श्रीकृष्ण त्यासाठी उद्धवाला अवधूत या विरक्त, आत्मानंदात मग्न असणाऱ्या तरुणाची कथा सांगतात. तो विरक्त का असतो? याचे उत्तर म्हणजे “अवधूत गीता” आहे. या अवधूतानेच हा सर्व उपदेश केला आहे, असा वृत्तांत सांगून श्रीकृष्णांनी उद्धवाला सुखदुःखाची अशाश्वतता कशी असते, हे सांगण्यासाठी अनेक उदाहरणे दिलेली आहेत. अनेक छोटे मोठे दाखले व गोष्टी या ठिकाणी आल्या आहेत. सत्संगतीचे महत्त्व, भक्ती व ध्यान यांचे महत्त्व, सर्व अष्टसिद्धींचे विवेचन करून भगवंत उद्धवाला — कुरुक्षेत्रावर अर्जुनाला जी विभूतीची पवित्र स्थाने सांगितली– तीच स्थाने सांगतात. सर्व प्राणिमात्रातील आत्मा मीच आहे वगैरे वगैरे.
यानंतर चार वर्ण, चार आश्रम स्वीकारताना लोकांनी कसे वागावे, याचा उपदेश कृष्ण उद्धवाला करतात. ते कसे कठीण आहे हेही इथे सांगितले आहे. पुढे वैराग्य युक्त ज्ञान,भक्तीयोग, कर्मयोग, ज्ञानयोग यांचे सविस्तर विवेचन श्रीकृष्ण करतात. पुढचे, शुद्ध काय, अशुद्ध काय याचे वर्णन तर आजच्या काळातही प्रत्येकाला उपयोगी पडणारे आहे.
अपवित्र: पवित्रो वा सर्वावस्थां गतोsपि वा |
य: स्मरेत् पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यंतर:शुचि: ||
या मंत्राने कोणत्याही कर्माच्या कर्त्याची शुद्धी होते, असे श्रीकृष्ण सांगतात.
मूलतत्त्वे किती? प्रकृती- पुरुष यात भेद की अभेद? याविषयी उद्धवाच्या शंकेचे निरसन श्रीकृष्णाने केले आहे. उद्धवाने एक प्रश्न विचारला आहे की, विद्वानांनाही दुष्ट लोकांनी केलेले अपमान सहन होत नाहीत. मग सामान्यांना ते कसे शक्य होईल? यावर श्रीकृष्णाने उद्धवाला जो उपदेश केला, तो “भिक्षु गीता” म्हणून प्रसिद्ध आहे. “मी” ही भावनाच या सर्वाला कारणीभूत ठरते. यानंतर सांख्य तत्त्वज्ञान, सत्व, रज, तम या तीन वृत्ती यांचे वर्णन आले आहे. पुढे पुरूरवा व उर्वशीची छोटी कथा आली आहे. श्रीकृष्ण उद्धवाला कर्मयोग पूजा पद्धतीची माहिती देतात. ज्ञानयोग भक्तीयोग वगैरे सविस्तर सांगून श्रीकृष्ण उद्धवाला बद्रिकाश्रमात जाण्याची आज्ञा देतात. भागवत धर्माचे चिंतन केल्याने तू जीवन्मुक्त होशील असे सांगतात.
यानंतरचा कथा भाग– द्वारकेत काही उत्पात सुरू होतात. ही यादवांच्या विनाशाची चिन्हे असतात. यावर श्रीकृष्ण सर्व यादवांसह प्रभासक्षेत्री शंखोद्धार तीर्थाला जाण्याचा पर्याय शोधतात. तिथे मद्य पिऊन सर्व यादव आपापसात लढले व यादव कुळाचा विनाश झाला. बलरामही समुद्र काठावर योगधारणा करीत बसले व सदेह पृथ्वीतल सोडून गेले. श्रीकृष्णही एका पिंपळाच्या झाडाखाली डावा पाय उजव्या मांडीवर ठेवून बसून राहिले. त्याचवेळी जरा नावाच्या शिकाऱ्याने हरीण समजून कृष्णाच्या पायावर अणकुचीदार बाण मारला. तो बाण जमिनीवर पडला. त्या भिल्लाने जवळ येऊन पाहिले तर त्याला चतुर्भुज श्रीकृष्णाचे दर्शन झाले. त्याला श्रीकृष्ण म्हणाले,” हे सारे माझ्या इच्छेनेच घडले आहे. मी आता तुला वैकुंठप्राप्ती देतो.” त्याच वेळी कृष्णाचा सारथी दारूक रथ घेऊन तिथे आला. त्याला सर्व हकीकत सांगण्यास कृष्णाने द्वारकेस धाडले. तो खिन्न मनाने द्वारकेस गेला. त्याने हस्तिनापुरासही हे वर्तमान कळविले. पुढचे वर्णन श्रीकृष्णाचे निजधामाला जाणे आणि द्वारका नगरी समुद्रात पूर्ण बुडणे याचे केलेले आहे. परमेश्वराच्या अवतार समाप्तीनंतर इथे अकरावा स्कंध समाप्त होतो.
बाराव्या स्कंधाच्या सुरुवातीला शुकाचार्य पृथ्वीवर पुढे कोणकोणत्या राजांनी राज्य केले, याची परीक्षिताला माहिती देतात. कलियुगात लोक कसे वागतील, जगतील याचे पूर्ण वर्णन, आजच्या काळात जे घडते आहे, तसेच तंतोतंत भागवतात केले आहे. पण त्यावर कलियुगातील दोषांवरचे उपायही सांगितले आहेत. प्रलय, युगे, कल्प यांचे वर्णन करताना शुकाचार्य सांगतात की, नैमित्तिक, प्राकृतिक, आत्यंतिक व नित्य हे चार प्रलयाचे प्रकार आहेत. शुकाचार्य परीक्षित राजाला सांगतात की, आपण मरणार! ही बुद्धी तू आता सोडून दे. कारण आत्मा अमर आहे.
परीक्षित राजाचा देह भस्मसात झाल्यावर त्याचा पुत्र जनमेजय सर्पयज्ञ करतो. ही कथा आली आहे. बृहस्पती त्याला उपदेश करतात. मग तो सर्पयज्ञ थांबवतो.सूत महर्षींनी शौनकांना ही कथा सांगितली. ते शौनकांना वेदविस्तार, विभागणी याविषयी विवेचन करतात. प्रथम शब्द ॐकाराविषयीची माहिती पुढे दिली आहे.
पुराणे म्हणजे काय? ती कोणती आहेत? याचे थोडक्यात वर्णन पुढे लेखकाने केले आहे. यानंतर मार्कंडेय ऋषींची कथा सांगितली आहे. त्यांना नरनारायणांनी वर दिला. त्यात त्यांनी प्रलयही अनुभवला. त्यांना नरनारायणांनी – तुम्ही कल्पांतापर्यंत अजरामर व्हाल, त्रिकालज्ञ व्हाल, पुराणांचे आचार्य व्हाल असा वर शंकरांनी प्रदान केला. पुढे सूर्याच्या सृष्टीचक्राचे वर्णन आले आहे. सनातन धर्म म्हणजे काय? हे पुढे शौनकांनी सूतांना सांगितले आहे. शिवाय पहिल्यापासून भागवतात कोणते विषय आले आहेत? त्या सर्व कथानकांचा थोडक्यात आढावा घेतला आहे. थोडक्यात — भागवतमहिमा वर्णिलेला आहे. अठरा पुराणांची प्रत्येकी श्लोक संख्या किती? हे सांगितले आहे. अकरावा स्कंध हे भगवंताचे मन तर बारावा स्कंध हा भगवंताचा आत्मा आहे. असे लेखक म्हणतात.
यानंतर लेखकाने ब्रह्मदेव, नारद, वेदव्यास, शुकाचार्य यांना वंदन केले आहे.
सर्वात शेवटी परमात्म्याला वारंवार नमस्कार करून लेखकाने भगवंताची प्रार्थना केली आहे.
इथे बारावा स्कंध समाप्त होतो व सातव्या दिवसाचा कथा भाग संपतो.
या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर परब्रम्ह परमात्म्याचे समग्र दर्शन घडविले आहे.
भवे भवे यथा भक्ति: पादयोsस्तव जायते |
तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यत: प्रभो ||१||
*
नामसंकीर्तनं यस्य सर्वपाप प्रशमनम् |
प्रणामो दुःख शमनस्तं नमामि हरीम् परम् ||२||
सर्वात शेवटी हे दोन श्लोक दोन वेळा म्हणून, सर्वांनी पोथीची पूजा करून, नैवेद्य आरती करावी व जयजयकार करावा असे लेखकाने सांगितले आहे. हा श्लोक म्हणजे भागवताचा उपसंहार आहे. संपूर्ण भागवत श्रवणाचा निष्कर्ष म्हणून, सर्व दुःखे दूर करून, निरंतर आनंद देणाऱ्या या भगवंत मूर्तीचे आपाद मस्तक ध्यान करून त्याच्या चरणारविंदाला नमस्कार करूया.
|| श्रीकृष्णार्पणमस्तु ||
इथेच मी प्रस्तावनेसह लिहिलेले आठ भाग संपले. भागवत कथेवरील सात पुस्तकांचे वाचन, अभ्यास आणि तोडके मोडके का होईना, पण विवेचन करण्याचे बळ मला परमात्म्यानेच दिले. हे माझे महद्भाग्य आहे. यात जर काही चुकत असेल तर आपण मोठ्या मनाने क्षमा करावी.
आकाशात तांबूस आभा ••• तोच तांबूल रंग जमीनीवर सांडलेला••• या दोघांना सांधणारी डोंगराची रांग•••डोंगर माथ्यावर चमचमणारी सोनेरी किरणे असलेला सोन्याचा गोळा•••
अहाहा नेत्रसुख देणारे हे सुंदर चित्र••• उगवत्या सूर्याचे आहे का मावळतीच्या सूर्याचे आहे हे समजणे कठीण.
पण काय सांगते हे चित्र? फक्त सकाळ किंवा संध्याकाळ झाली आहे एवढेच ? नक्कीच नाही.
१.झरा म्हटले तरी एक सदा पुढे जाणारा चैतन्याचा स्रोत जाणवतो. पण या सोनेरी रंगामुळे हा झरा रुपेरी न रहाता सोन्याचा होऊन जातो.
२.झर्याचा उगम नेहमीच डोंगरमाथ्यावरून होतो. हा सोन्याचा झरा पण डोंगर माथ्यावर उगम पावला आहे.
३. पुढे पुढेच वाहणारा हा स्रोत अनेक आशेची, यशाची, प्रगतीची रोपटी वाढवतो आणि याच रोपट्यांचे डेरेदार वृक्षात परिवर्तन होणार असल्याची ग्वाही देतो. हे सांगताना या सोनेरी वाटेवर चितारलेली छोटी झुडुपे आणि वर मोठ्या झाडाची फांदी एक समाधानकारक लहर मनात निर्माण करते.
४. जमीन आणि आकाश सांधणारे डोंगर खूप मोठा आशय सांगतात. जमिनीवर घट्ट पाय रोऊन उभे राहिले तरी आकाशा एवढी उंची गाठता येते.
५. तुमच्या मनात आले तर तुम्ही आकाशाला गवसणी घालू शकता .ते सामर्थ्य तुमच्यामधे आहे .फक्त त्याची जाणिव सूर्यातील उर्जेप्रमाणे तुम्ही जागवा.
६. सूर्यातून ओसंडणारी ही आभा दिसताना जरी लहान दिसली तरी तिचा विस्तार केवढा होऊ शकतो हे प्रत्यक्ष तुम्ही जाणा.
७. जैसे बिंब तरि बचके एवढे।
परि प्रकाशा त्रैलोक्य थोकडे।
शब्दांची व्याप्ति तेणें पाडे।
अनुभवावी।। (श्रीज्ञानेश्वरी : ४-२१३)
ज्ञानेश्वरीतील या ओवी प्रमाणे तुम्ही स्वत: जरी लहान वाटलात तरी तुमच्यातील सामर्थ्य तुमचे कर्तृत्व यामुळे तुम्ही मोठे कार्य निश्चित करू शकता या आदर्शाची आठवण करून देणारा हा दीपस्तंभ अथवा तेवती मशाल वाटतो .
८. त्यापुढे आलेला देवळाचा भाग , देवळाची ओवरी, त्यावर विसावलेला माणूस ••• हे सगळे जे काही माझे माझे म्हणून मी गोळा केले आहे ते माझे नाही .हे या परमात्म्याचे आहे याची जाणिव मला आहे हे मनापासून या भगवंताच्या दरबारात बसून मी भगवंताला सांगत आहे. असा अर्थ प्रतीत करणारे हे चित्र वाटते .
०९. देवाला जाताना नेहमी पाय धुवून जावे. तर मी देवळात जाताना या सुवर्णसुखाच्या झर्यात पाय धुवून मी तुझ्याकडे आलो आहे .हे सांगत आहे.
१०. हे सगळे नक्की काय आहे हे सांगायला सोन्यासारख्या पिवळ्या धम्मक अक्षरांनी लिहिलेले सुवर्णसुखाचा निर्झरू हे शिर्षक.
११. यातील निर्झरू या शब्दाने त्यातील लडिवाळपणा जाणवतो. आणि हा निर्झर सुवर्णाचाच नाही तर तसेच सुख देणारा आहे हे सांगतात.
१२. ना सकाळ ना रात्र, ना जमिनीवर ना आकाशात, ना मंदिरात ना मंदिराबाहेर, ना दृष्य ना अदृष्य अशा परिस्थीतीत नरसिंहासारखे ना बालपणी ना वृद्धापकाळी घडलेले हे परमात्म्याचे दर्शन आहे असे वाटते .
अशा छान मुखपृष्ठासाठी सुनिल मांडवे यांना धन्यवाद.
अशा छान मुखपृष्ठाची निवड केल्याबद्दल प्रकाशक सुनिताराजे पवार आणि लेखक एकनाथ उगले यांचे आभार
☆ पाचवा कोपरा (मराठी कथासंग्रह) – लेखिका – प्रा. सुनंदा पाटील ☆ परिचय – सौ. प्रभा हर्षे ☆
लेखिका प्रा.सुनंदा पाटील
प्रकाशक शब्दान्वय प्रकाशन, मुंबई
पृष्ठे 136
मूल्य रु 250/-
प्रा. सुनंदा पाटील
प्रा. सुनंदा पाटील यांचे जेष्ठ नागरिकांना समर्पित केलेला कथासंग्रह आजच वाचून पूर्ण केला.
कथा वाचनापूर्वी लेखिकेचे मनोगत ही वाचले होते ते जरा मनात धाकधूक ठेऊनच ! याचे कारण अस कि जेष्ठंना सूचना, सल्ला, पर्याय हे सतत मिळत असतात . सांगणाराही मदत करण्याच्या उद्देशाने किंवा त्रास कमी करण्याच्या हेतूनेच सांगत असतो. पण प्रत्येक घरातील माणसांची पध्दत व आर्थिक परिस्थिती वेगवेगळी असल्याने हा सल्ला वापरता येतोच अस नाही.अशावेळी जर मानसिकरित्या संभ्रमीत असलेल्या जेष्ठ नागरिकांना दिलासा मिळतो तो प्रत्यक्ष अश्या परिस्थितीतून वाट काढणाऱ्या आपल्या सहकारी मित्रांची. नेमकी हीच उपलब्धी या कथांनी दिली आहे.
कथासंग्रहातील कथा जेष्ठांच्या असल्या तरी वैविध्य पूर्ण आहेत. एकट्याने रहाताना आपली पेंटिंग ची आ्ड जपणार्या भरारी मधील सुनिताताई असोत किंवा वाटचाल मधल्या शारदबाई वागळे असोत , आपल्या छंदांना त्यांनी म्हातारपणीच्या काठीचा मान दिला, तर मनात ओसंडून वाहणाऱ्या मायेला मला आई हवी अस म्हणणाऱ्या मुलाला माधवीताईंनी आईची माया दिली. रिटायर झालेल्या अण्णांना पैशाची नड भासू लागली तेव्हा त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची संस्कृत ची आवड हेरून पौरोहित्याचा मार्ग दाखवला विक्री या कथेतील मनोहरपंतांनी आपल्या भावांचे नाते पैशापेक्षा जास्त मोलाचे मानले. मोकळा श्वास मधील अक्कानी तर मला जोरदार धक्काच दिला. ज्या आक्का देवासमोर माझ्याआधी माझ्यापतीचे निधन होउदे असे मागणे मागत होत्या त्या घर सोडायची हिमंत बांधतात वजरा छोट्या गावात घर घेऊन स्वतंत्र राहू बघतात ही धीराची कल्पना आहे.
ज्या कथेचे नाव कथा संग्रहाला दिले आहे ती पाचवा कोपरा ही कथाही वास्तवाशी नाते सांगणारी आहे.घरात उपर्यासारखी मिळणारी वागणूक, साध्या साध्या गोष्टी वर लादलेली बंधने, आवडीच्या गोष्टींना मुद्दाम अडथळे आणणे या सर्व गोष्टींना वैतागून श्रध्दाताई वृध्दाश्रमात रहायला जातात व तेथे आपला लिखाणाचा छंद पुरा करतात .हे सर्व करताना त्यांनी आपला मनाचा मोठेपणा जपला आहे. त्या मुलाला आपल्या अकौंटमधले पैसे काढून मोठे घर घेण्यास सुचवतात. आपल्या घरातील माणसांना कमी लेखू नये, क्षमता ही स्वतंत्र गोष्ट आहे त्याचा आदर करायला शिक हेही त्या सांगायला विसरत नाहीत. अत्यंत भावपूर्ण शब्दांत लेखिकेने कथेचा शेवट केला आहे.
सर्व कथांचे तात्पर्य मात्र सर्व जेष्ठांनी लक्षात ठेवले पाहिजे .. ते म्हणजे जेवायचे ताट द्यावे पण बसायचा पाट देउ नये अशी आपली जुनी म्हण. ही मात्र वारंवार प्रचितीस येते.
लेखिकेने आपल्या मनोगतात आपले विचार व्यक्त करतानाही ही अपेक्षा ठेवली आहे. पुस्तकाच्या समारोपाच्या कथेनंतर वाचकाचाही हाच विचार पक्का झाला तर लेखनाचे सार्थक झाले असे होईल.
सर्व जेष्ठांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे.
परिचय : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
श्रीकृष्णाच्या अद्भुत लीलांनी व कथांनी युक्त असा भागवतातील दहावा स्कंध म्हणजे जणू भागवताचा आत्माच!! मागील भागात आपण या दहाव्या स्कंधातील पूर्वार्ध पाहिला. (पाचव्या भागात).आता या दहाव्या स्कंधाचा – पर्यायाने- श्रीकृष्ण चरित्राचा उत्तरार्ध पाहू या.
सहाव्या दिवसाची सुरुवात लेखकाने वेदस्तुती या कथा भागाने केली आहे. शब्दांनी वर्णन न करता येणाऱ्या परब्रम्ह परमात्म्याची वेदांनी केलेली ही स्तुती आहे. भागवत ग्रंथामध्ये दशम स्कंधाच्या ८७ व्या अध्यायातील हे २८ श्लोक म्हणजे वेद वेदांताचे सार आहे असे लेखक म्हणतात. वाचायला फारच कठीण असणाऱ्या पण सुंदर संस्कृत श्लोकांनी आणि या वेदस्तुतीने सहाव्या दिवसाची सुरुवात लेखकाने केली आहे.
नंतर लेखक पुन्हा श्रीकृष्ण चरित्राकडे वळले आहेत. शुकाचार्य परीक्षित राजाला कंसवधा नंतरची कथा सांगतात. कंस हा जरासंधाचा जामात होता. जरासंधाच्या दोन मुली अस्ति आणि प्राप्ति या कंसाच्या पट्टराण्या होत्या. कंस वधा नंतर त्या पित्याकडे गेल्या तेव्हा जरासंधाला दुःख व संताप झाला. त्याने तेवीस अक्षौहिणी सैन्यासह मथुरेला वेढा घातला. संपूर्ण यादव कुळ नष्ट करण्याचे ठरवले. श्रीकृष्णानेही पृथ्वीवरील हा दैत्य भूभार कमी करण्याचे ठरवले. आकाशातून सूर्यरथासारखे तेजस्वी दोन रथ पृथ्वीवर उतरले. कृष्णाने एक बलरामाला दिला. श्रीकृष्णाचा दारुक नावाचा सारथी होता. यानंतरच्या या तुंबळ युद्धाला सुरुवात कशी झाली, परस्परांशी कसे युद्ध खेळले गेले , शस्त्रविद्या वगैरेचे अतिशय रोचक, अंगावर काटा आणणारे वर्णन लेखकाने केले आहे. जरासंधाचा पूर्ण पराभव करूनच श्रीकृष्ण मथुरेला परतले. जरासंध पुन्हा मगध राज्यात परतला. पण नंतर असेच तेवीस अक्षौहिणी सैन्य घेऊन त्याने एकूण सतरा वेळा मथुरेवर हल्ला केला. प्रत्येक वेळी त्याचे सारे सैन्य नष्ट करून श्रीकृष्णाने त्याला उदारपणे सोडून दिले. पण भूभार नष्ट केला.
अठराव्या वेळी कालयवन नावाचा म्लेंच्छ तीन कोटी सैन्य घेऊन आला. हे संकट महा भयंकर आहे . हे जाणून श्रीकृष्णाने समुद्रात बारा योजने दूर विस्तीर्ण नगरी विश्वकर्म्या कडून वसवून तिथे सर्व यादवांना सुरक्षित ठेवले. हीच द्वारका नगरी होय!! या नगरीचे वर्णन लेखकाने अत्यंत सुंदर केले आहे. त्या नगरीतून बाहेर पडणाऱ्या श्रीकृष्णाचा कालयवनाने पाठलाग केला. कालयवनाला एका गुहेपर्यंत आणून मांधाता राजाचा मुलगा मुचकुंद याचे कडून त्याला भस्मसात करविले. ही मुचकुंदाची कथाही खूपच सुंदर रंगविली आहे. श्रीकृष्ण रणांगणातून पाठ दाखवून पळाले म्हणून त्यांना रणछोडदास नाव पडले . जरासंधही त्यानंतर पुन्हा युद्धास आला त्या युद्धाचेही वर्णन खूपच रंजक आहे.
यानंतरची रम्य व रसाळ कथा रुक्मिणी स्वयंवर, रुक्मिणी हरण याची आहे. ही कथा प्रत्यक्ष वाचावी अशीच आहे.स्वयंवरानंतर कृष्णाने जमलेल्या सर्व राजांच्या देखत रुक्मिणीला रथात बसवले. शिशुपाल व रुक्मिचा पराभव केला (रुक्मि हा रुक्मिणीचा भाऊ !) आणि श्रीकृष्ण रुक्मिणीस घेऊन द्वारकेला गेले. शंकराने कामदेवाला (मदनाला) भस्म केले. तेव्हा मदनाने पुन्हा देह मिळावा म्हणून भगवंताची प्रार्थना केली होती. तोच कामदेव, भगवंत व रुक्मिणीच्या पोटी प्रद्युम्न म्हणून जन्माला आला. त्या प्रद्युम्नाची छोटी कथा पुढे आली आहे .नंतर श्रीकृष्णाचा जांबवती व सत्यभामाेशीही विवाह झाला. पुढे स्यमंतक मण्याची मनोरंजक कथा आहे. यानंतर श्रीकृष्णाने कालिंदी व इतर स्त्रियांशी विवाह केल्याची कथा आहे. तसेच श्रीकृष्णांनी इंद्राचे छत्र बळकावणाऱ्या नरकासुरास ठार केल्याची रम्यकथा लेखकाने वर्णन केली आहे. त्याने बंदीवासात टाकलेल्या सोळा सहस्त्र स्त्रियांशी भगवंताने तितकी रुपे घेऊन विवाह केले. श्रीकृष्णाने एकदा गंमतीने रुक्मिणीच्या पती प्रेमाची परीक्षाही घेतली. ही कथा खूप छान रंगविली आहे.
यानंतर श्रीकृष्णाच्या मुख्य आठ राण्यांची नावे सांगितली आहेत. रुक्मिणी, सत्यभामा, जांबवती, सत्या (नाग्नजिती), कालिंदी, लक्ष्मणा, मित्रविंदा, भद्रा अशा या आठ राण्या!! या राण्यांच्या मुलांची ही नावे सांगितली आहेत .या सोळाहजार स्त्रियांनाही प्रत्येकी दहा मुले झाली असल्याचा उल्लेख आहे. प्रद्युम्नाचा विवाह रुक्मिची कन्या रुक्मवती हिच्याशी तर प्रद्युम्नाचा मुलगा अनिरुद्ध याचा विवाह रुक्मिची नात रोचना हिच्याशी झाला होता. बाणासुर दैत्याची मुलगी उषा! हिचे अनिरुद्धावर प्रेम होते. त्याचे सुंदर वर्णन कथाकाराने केले आहे. त्यावरून बाणासुराचे श्रीकृष्णाशी युद्ध झाले. त्याला कृष्णाने मुक्ती दिली.
या आणि यापुढील काही कथा आपल्याला माहीतही नसाव्यात. श्रीकृष्णाची मुले खेळत असताना त्यांना कृकलास नावाचा पर्वतप्राय खेकडा दिसला. श्रीकृष्णाने त्याला विहिरीतून बाहेर काढले. तो पूर्वजन्मी इक्ष्वाकूचा मुलगा नृग नावाचा दानशूर राजा होता. या नृग राजाला त्याची चूक नसताना केवळ गैरसमजाने खेकड्याचा जन्म मिळाला ही कथा आहे.
एकदा बलरामांनी गोकुळाला भेट दिली, त्याचे वर्णन पुढे दिले आहे. पुढची कथा स्वतःला श्रीकृष्ण समजणाऱ्या पौंड्रकाची आहे. त्याच्याशी युद्ध करून कृष्णाने सुदर्शन चक्राने त्याचे मस्तक उडविले. काशी राजाचा वध केला. ते पाहून सुदक्षिण नावाचा काशीराजाचा मुलगा श्रीकृष्णावर चालून आला. त्याचाही वध कृष्णाने सुदर्शन चक्राने केला व काशीनगरीही भस्मसात केली. बलरामांनीही काही अद्भुत पराक्रम केले. त्याच्या कथा शुकाचार्यांनी परीक्षित राजाला सांगितल्या आहेत. द्विविद नावाच्या वानराचा वध बलरामाने केला. तो सुग्रीवाचा मंत्री होता. पण नरकासुराचा परममित्र होता. बलरामाने हस्तिनापुरास जाऊनही खूप पराक्रम गाजविला. कौरव घाबरले. दुर्योधनाने बलरामाला बाराशे हत्ती, एक लाख वीस हजार घोडे, सहा हजार सुवर्ण रथ आंदण दिले.
नारद मुनींनी एकदा द्वारकेस जाऊन श्रीकृष्णाचा संपूर्ण संसार व परिवार पाहिला. या कथेनंतर श्रीकृष्णाची दिनचर्या लेखकाने वर्णन केली आहे. नंतर भीमाकरवी श्रीकृष्णाने युक्तीने जरासंधाचा वध करविला. ही कथा आहे. जरासंधाने बंदी बनवलेल्या सर्व राजांची मुक्तता श्रीकृष्णाने केली. शिशुपालाचे शंभर अपराध भरल्यावर त्याचा सुदर्शन चक्राने वध केला. तीन जन्म तो वैरभावनेने का होईना कृष्णाचाच जप करीत होता. त्यामुळे शिशुपालाला कृष्णाने मुक्ती दिली.
मयासुराने निर्माण केलेल्या भवनात दुर्योधनाची फजिती झाली. तेव्हा द्रौपदी त्याला हसली. मग दुर्योधन संतापला. ही कथा थोडक्यात सांगितली आहे. यानंतर शाल्व या शिशुपालाच्या मित्राचा वध, बलराम कौरव पांडवांच्या युद्धात निष्पक्ष म्हणूनच राहिले, ते तीर्थयात्रेस निघून गेले ही कथा आहे. बलराम नैमिषारण्यात आले. प्रभास क्षेत्री गेले. तिथून द्वारकेस परतले. या काळात त्यांनी अनेक पराक्रम केले. त्याचे वर्णन लेखकाने केले आहे.
यानंतरची कथा सुदाम्याची आहे. ही कथा सर्वांनाच ज्ञात आहे. ती लेखकाने फारच सुंदर वर्णलेली आहे. सुदाम्यावर कृष्णाने अनुग्रह केला. यानंतर श्रीकृष्ण खग्रास सूर्यग्रहणाचे वेळी स्यमंतपंचक या क्षेत्री गेले. तिथे त्यांची नंद यशोदा व इतर गोपगोपींची भेट झाल्याचे वर्णन आहे.द्रौपदीने सर्व कृष्णपत्नींची भेट घेतल्याची कथा पुढे आली आहे.वसुदेवाने श्रीकृष्णा कडून कर्माचा निरास कसा होईल याविषयी सर्व तत्त्वज्ञान समजून घेतले. श्रीकृष्णांनी देवकीची इच्छा पूर्ण करण्यासाठी, तिला कंसाने मारलेली तिची सात मुले देखील ब्रह्मदेवाकडून आणून आईला त्यांची भेट घडविली.
पुढे सुभद्रा हरणाची कथा आहे. बहिणीच्या स्वयंवराचे वेळी तिचे हरण करण्यास अर्जुनाला श्रीकृष्णाने मदत केली. हा कथा भाग आहे. यानंतर वृकासुराची कथा आहे. त्याने शंकराची आराधना करून- मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो जळून जावा- म्हणून वर मागितला. त्यामुळे पृथ्वीवर हाहा:कार माजला. श्रीविष्णूंनी एकदा बटूचे रूप घेऊन त्याला सांगितले की शंकराने तुला खोटा वर दिला आहे. तू त्याची प्रचिती पहा. असे म्हणून त्याला स्वतःच्या डोक्यावर हात ठेवायला लावला आणि त्याला युक्तीने भस्मसात केले.
शेवटी द्वारकेचे वैभव व कृष्ण महिमा या वर्णनाने दहाव्या स्कंधाची व सहाव्या दिवसाच्या कथा भागाची समाप्ती होते.
सहाव्या दिवसाच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर विष्णूंच्या गळ्यातील वैजयंती माळेचे चित्र आहे. तिच्यात मुक्ता, माणिक्य, मरकत, इंद्रनील,हीरक ही पाच रत्ने गुंफलेली असतात. ती पाच रंगांची व गुडघ्यापर्यंत लांब असते. ही माला पंचमहाभूते व पंचतन्मात्रा यांचे प्रतीक आहे.
काल श्री घावटे सर यांचा षष्ट्यब्दीपूर्तिसमारंभ उत्कृष्ट रितीने पार पडला देखणे सरांच्या आशिर्वादानेच कदाचित देखणा सोहळा झाला असावा.
असो.
त्या कार्यक्रमाबद्दल सगळ्यांनी लिहिलेच आहे. पण मला मात्र काल ज्या पुस्तकाचे प्रकाशन केले त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाबाबत आवर्जून लिहावेसे वाटले.
मनात विचार आला कविता पुस्तक किंवा लेखनकृती या बद्दल रसग्रहण बरेच करतात. पण ज्या मुखपृष्ठामुळे पुस्तकाची ओळख बनते ते मुखपृष्ठही खूप विचारपूर्वक अतिशय परिश्रमाने बनलेले असते.
त्यामुळे त्या मुखपृष्ठाचा अर्थही लोकांनी ग्रहण करावा म्हणजे मग त्या पुस्तकाला खरा न्याय मिळेल असे मला वाटते .
म्हणूनच कालच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ मला अतिशय भावले. पुस्तकातील लेखनाशी तादात्म्य साधणारे अतिशय कमी गोष्टींमधून खूप मोठा विचार देणारे आणि बरेच काही सांगून जाणारे आहे.
कदाचित मी जे पाहिले मला जे दिसले त्यापेक्षा जास्त अर्थही असू शकेल या चित्राचा. पण मला भावलेले माझ्या नजरेने सांगितलेले अर्थ मी उलगडून सांगणार आहे.
प्रथमत: इतके चांगले मुखपृष्ठ करणार्या श्री संतोष घोंगडे यांचे आभार.
०१) प्रथमत: मुखपृष्ठावर मध्यभागी असलेल्या चित्रावर नजर केंद्रित होते आणि दिसते डमरूच्या आकाराचे हे चित्र.
*** यामधे हा डमरू म्हटला तर श्री शंकराचे हे वाद्य तिन्ही लोकात याचा आवाज जाईल हे सांगते.
*** जर डमरू म्हणून नाही पाहिले तर मोठमोठ्या देवालयात वाजणारा चौघडा किंवा नगारा किंवा डंका आहे. हा नगारा त्रेलोक्यात याचा त्याचा डंका पिटणार आहे.
*** जर हे दोन्ही नसेल तर देवीचा संबळ याचे दोन भाग एकावर एक ठेऊन हा संबळ आता जागरण गोंधळ मांडणार आहे आणि जागर करणार आहे.
०२) नंतर लक्ष जाते त्यावरील दोन भगव्या पताकांकडे
*** या पताका म्हणजे समईतील दोन फडकणार्या वाती वाटतात
*** ज्योत से ज्योत जलाते चलो हा पण अर्थ त्यातून निघू शकतो. मोठ्या ज्योतीने म्हणजे मोठ्या पिढीने आपले ज्ञान पुढच्या लहान पिढीला सांगितले पाहिजे. ही ज्ञानज्योत ही ज्ञान पताका सदा फडकत राहिली पाहिजे.
*** ही पताका म्हणजे वारकरी संत वैष्णवांची द्योतक आहे अशी ही पताका संस्कृती परंपरा यांचे प्रतिक आहे. जणू संस्कृती जागर करत आहे
*** हीच पताका राजे शिवछत्रपती यांच्या यशोगाथा प्रत्येक मराठा मावळा शिवभक्तच नाही तर अटकेपारही झेंडा फडकावते.
***घावटे सर स्वत:ही शिवाजीराजे भक्त आहेत हे कार्यारंभी केलेल्या शिवाजी प्रतिमापूजनाने लक्षात आलेच असेल. म्हणून त्यांच्याप्रतीची ही कृतज्ञताही यातून व्यक्त होते.
शिवाजी शिवाय राष्ट्र पूर्ण होऊच शकत नाही म्हणून राष्ट्र जागर ही चालला आहे
*** या पताकाच्या काड्या उद्बत्ती सारख्या दिसतात. या उद्बत्तीचा दरवळ आसमंतापर्यंत जावा.
०३) नंतर लक्ष जाते या चित्राच्या सावलीकडे•••
*** ही सावली देवघरातील निरांजनाप्रमाणे दिसते. पुन्हा संस्कृती जागर.
*** हा जागर करताना त्यातील ज्योत मोरपिसाचा आकार घेऊन येते. म्हणजेच हा जागर मनात कल्लोळ निर्माण न करता मनाला एक मोरपिशी स्पर्श देऊन जातो.
*** मोरपिसामधला डोळा म्हणजे सगळ्या वाचकांनी मनाच्या डोळ्यांनी हे वाचन करावे असे सुचवते
*** हाच डोळा स्त्री गर्भासारखा वाटतो
डोक्यावर पदर घेतलेल्या स्त्री सारखा वाटतो
स्वत: एका कोषात गुंतलेल्या स्त्री प्रतीमेचा वाटतो .
•• हेच नारी सन्मानाचे द्योतक वाटते
हेच नारींना सबला करण्यासाठी मांडलेल्या विचाराचे प्रतिक वाटते
*** अर्थातच समाजातील स्त्री प्रतीमा उज्वल करण्यासाठी केलेला समाज जागर वाटतो .
०४) नंतर लक्ष जाते या संपूर्ण चित्राच्या बाजूला असलेल्या दोन कोयर्यांकडे
*** पुन्हा संस्कृती प्रतीक
*** या कोयर्या म्हणजे पताकांची फडफडणारी ज्योत मालवू नये म्हणून केलेले हातांचे कोंदण वाटते . आपली श्रेष्ठ परंपरा सांगणारी ही छोटीशीच प्रतिमा.
*** नीट पाहिले तर लक्षात येते या कोयर्या म्हणजे अवतरण चिन्ह आहे. जे घावटे सरांचे म्हणणे या पुस्तकातील अवतरणात घेऊन आले आहे. हा प्रबोधन जागर चालला आहे.
०५) त्यानंतर बाजूला स्पष्टपणे दिसणार्या अस्पष्ट रेषांकडे लक्ष जाते
*** त्यामधे दिसतात असंख्य चेहरे ते समाजाचे प्रतिक आहे आणि हा समाज जागर चालला आहे सांगते.
*** हेच चेहरे आपल्या राष्ट्राचे द्योतक आहे म्हणून या राष्ट्रासाठी मांडलेला राष्टीय जागर ही वाटतो .
०६) नंतर लक्ष जाते रेषांच्या सरस्वतीकडे
*** हे ज्ञानाचे प्रतिक आहे ज्ञान जागर चालला आहे.
*** ज्या सरस्वतीने ही बुद्धी दिली त्या ज्ञानदे प्रती कृतज्ञता व्यक्त होत आहे
*** अज्ञान तिमीरांधस्य ज्ञानांजन शलाकया प्रमाणे जेथे जेथे अज्ञान आहे तेथे तेथे यातील ज्ञान शलाकेने जीवन उजागर होवो म्हणून दिसणारा हा तेजोमय प्रकाश अर्थातच सफेद रंगात लिहिलेली अक्षरे••• “चैतन्याचा जागर”
खरोखर इतके बोलके मुखपृष्ठ नक्कीच पुस्तक वाचायला प्रेरणा देणारे आहे.
सरांनी समाज जागर , संस्कृती जागर, राष्ट्रीय जागर, विकास जागर, प्रबोधन जागर या पाच विभागात जरी विभागणी केलेली असली तरी ज्ञान जागर, देवी जागर, शारदा / सरस्वती जागर इ अनेक जागरांच्या नद्या मिळून निर्माण होणार्या चैतन्य सागराचा हा चैतन्य जागर आहे. पुस्तकात काय आहे हे चटकन सांगणारे हे चित्र आहे.
एखादी सुंदर तरूणी पाहिल्यावर तिच्या मनात काय चालले आहे हे तिच्या चेहर्याकडे पाहिले डोळ्यात बघितले तरी लगेच समजते.तसेच या मुखड्यावरून अंतरंग लगेच समजते.
हे मुखपृष्ठ या जागराची शक्ती दाखवणारे आहे.
मला तर वाटते नुसते चित्र एक सुरेख पेंटींग होऊन घरातील भिंतीवर यायलाही काही हरकत नाही. सतत नजरेसमोर जागर राहील.
या उत्कृष्ट मुखपृष्ठ चित्रासाठी श्री संतोषजी घोंगडे यांचे पुन्हा आभार.
एक चित्र परिक्षण करण्याची संधी मिळाली म्हणून हे चित्र निवडणार्या घावटे सरांचे आणि संवेदना प्रकाशनच्या नितीनदादा हिरवे यांचेही आभार.
☆ निशिगंध (भावगीत संग्रह) – कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर ☆
कवी: डॉ. निशिकान्त श्रोत्री
प्रकाशक: नीलकंठ प्रकाशन (श्री प्रकाश रानडे)
पृष्ठ संख्या: २१२
किंमत: Rs. २००
डॉक्टर निशिकान्त श्रोत्री हे नाव साहित्य क्षेत्रात खूप प्रसिद्ध आहे. त्यांच्या या भावगीत संग्रहात भक्तीपासून शृंगारापर्यंत विविध अंगांना आणि विषयांना स्पर्श करणारी गीते असल्यामुळे विषयांनुसार गीतांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. एकूण नऊ भागात ही गीते विखुरली आहेत. भक्ती, देशभक्ती, चिंतन, प्रीती, युगुल, विरह, शृंगार सगे सोयरे आणि नारी जीवन असे हे विभाग आहेत. जवळजवळ २०० हून अधिक गीते यात समाविष्ट आहेत आणि सगळीच गीते एकाहून एक सरस आहेत.
या गीत वाचनात वाचक अगदी सहजपणे रमून जातो ते त्यांतील सुंदर शब्दरचना आणि तितक्याच सुंदर विचारांमुळे. गीतांच्या शब्दांत अडकत असतानाच अगदी सहज प्रत्येक विभागासाठी काढलेली रेखाचित्रेही खूप बोलकी आहेत. या रेखाटनांंमुळे गीते वाचणारा रसिक त्या वातावरणाशी या चित्रांमुळे पटकन जोडला जातो.
वास्तविक यातली सारीच गीते म्हणजे उत्तम काव्य, अनमोल विचार, भाषा, भावना यांचा एक समृद्ध झराच आहेत. सर्वच गीतांविषयी लिहिणे केवळ अशक्य आहे. मात्र काही लक्षवेधी भावगीतांबद्दल आपण इथे नक्कीच बोलूयात.
भक्ती विभागातील पहिलेच गीत गणनायका. गणेश प्रार्थना सादर करून या पुस्तकाची सुरुवात एक सुंदर भक्ती पूर्ण आणि “प्रथम वंदना तुजला गणेशा” या पारंपारिक प्रथेप्रमाणे होते.
धन न वांच्छितो संपत्ती हिरे
दर्शन दे मजला कर ठेवून शिरावरती या.. आशीर्वच दे मला…
संग्रहाची सुरुवातच अशी भक्तीमय, लीन आणि नम्रतेने होते. कलाकार कसा नम्र, समर्पित असावा याची जाणीव होते. या विभागात अनंत स्तोत्र, शारदा स्तवन, भूपाळी, प्रार्थना, गवळण, परमेश्वराची, ब्रह्मचैतन्याची केलेली आळवणी आहे.
जनमनाचा अधिनायक
कोट्यावधीचा तो विधायक
व्यापिले ज्याने अंतःकरणाला अभिमानाने जगायला
राज्य राज्यांच्या देशभक्तीला जाती-जातीच्या मिलनाला
लोक तंत्राने एकवटला
मान देऊया तिरंग्याला
वंदू या भारत देशाला..
(वंदू या भारत देशाला)
…वरील प्रत्येक ओळीमध्ये देशाप्रती गौरवाची, अभिमानाची भावना जागृत करण्याचं सामर्थ्य जाणवतं.
वैभवात जी नाती जपली.
दैन्ये ना त्यागली
नसे अपेक्षा कृतज्ञ प्रीती
मनात जोपासली…
— ‘ वेध निवृत्तीचे ‘ या कवितेत ते म्हणतात,
कर्मयोग हे दैव जाणिले
अविरत गतीला नाही रोखले
चल चक्राची गती थोपवा
काया शिणली
कार्य संपवा…
जीवनाविषयी केलेले सखोल चिंतन या काव्यरचनांतून जाणवतं. कुठेतरी थांबायला शिकलं पाहिजे हा जीवनानुभवातून आलेला अनमोल संदेश कवी सहज जाता जाता देऊन जातात.
अतिशय हळुवार, अलवार, कोमल मोरपिशी, शब्दांतून कवीचे प्रीत काव्य उलगडत जाते.
मुक्त संचार तुझा माझ्या गे स्वप्नात
कधी असतो का रात्री मी तुझ्या ध्यानात
करितो अर्ज मी मुग्ध तुझ्या नयनाते
एकदा घेई मजला बंद तुझ्या पापणीते
(एक वार हळूच पाहू दे)
…या गीतातल्या या सुंदर प्रेमाचं आर्जव करणाऱ्या ओळी. एखाद्या सुकलेल्या, व रुक्ष मनालाही उमलवतात आणि गतकाळाच्या आठवणीत रमवतात.
युगुल विभागातील गीते तो आणि *ती*चीच आहेत. या गीतांमध्ये इतकं माधुर्य आणि गेयता आहे की वाचता वाचता आपण सहजच मनाचा एक ठेका पकडतो.
ती: तुझं जालं मी ल्याले
मन तुजं मी प्याले
जीव तुज्यात विरलाय माजा
लाटं लाटंत झेलिन होरी तुजी मी
जीवाचा तू तर राजा..
तो: का डोल्यात पानी तुज्या
व्हटात गानी
रानी खरी जीवाची माज्या… या कोळीगीतातला प्रेमाचा हळुवार अविष्कार आणि ठसका, एकमेकात गुंतलेली मनं वाचकांच्या हृदयात आनंदाच्या लाटाच उसळवतात.
पाजुनी दवबिंदू
मी कलिका मनी जोपासली
कंटकाची बोच म्हणून
दूर तिज सारू कशी..
(भैरवी)
किंवा..
जगण्याची आशा जात असे सुकून
साथ नसताना कसे जा जगू जीवन
(खिन्न कातरवेळ)
अबोल्यात जर जगायचे
तर प्रतीक्षा तुझी कशासा गे
पहायचे जर नसेल तुजला
नेत्र मिटू दे अखेरचे..
(दिवा स्वप्न)
विरहाचे बोचरे दुःख व्यक्त करणारी ही गीते खरोखरच मन उदासही करतात. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी विराणीचे क्षण येतातच. त्या क्षणांना पुन्हा एकदा भावनांचा झोका या गीतांमुळे दिला जातो. इतक्या सजीवपणे या गीतांचे लेखन झालेलं आहे.
पाकळी चुंबता अंतरी लाजले
चिंब पदरातुनी वक्ष आसुसले
दाटली आर्तता नयन पाणावले
स्पर्श तव जाहला प्रेम अंकुरले
(चित्त धुंदावले)
शृंगारातला उन्नतपणा, आतुरता, देहभावना, लज्जा, औत्स्युक्य या साऱ्या प्रणय भावनांचं सुरेख मिश्रण या शब्दांतून ठायी ठायी पाझरतं. पण तरीही या शब्दांमध्ये कुठेही अश्लीलता जाणवत नाही. इथे राखलेलं आहे ते शृंगाराचं पावित्र्य आणि हेच या गीतांचं वैशिष्ट्य.
काही नाती ही जन्मभर आपल्या सोबत राहतातच. त्या व्यक्ती या जगात असोत वा नसोत पण त्यांनी जे दिलेलं आहे ते आपल्या आयुष्यासोबत अखंड येत असतं. याची जाण देणारी सुंदर गीते सगे सोयरे या भागात वाचायला मिळतात. ही गीते वाचताना कुठेतरी कवीच्या मनातली सगे सोयऱ्यांविषयीची कृतज्ञता ही जाणवते.
सुकून जाईल कैसे जीवन
पाखर धरी ती दृष्टी
कितीक रुजले किती उमलले
कृतज्ञतेची वृष्टी
आज पोरकेपणी वरद हा आहे आधाराला
उजाड धरतीवरी पसरला पावन पाचोळा
(दोन तरुंची छाया )
निसर्ग नियमाप्रमाणे सोडून गेलेल्या मात्यापित्यांनी पसरवलेल्या अनेक संस्कार पर्णांना ते पावन पाचोळा असं संबोधून त्यांच्या ममतेचा गौरवच करतात.
जीवन सारे शिल्प जाहले
तुझीच ही किमया
कवतुक तुझीया नयना मधले
मोहरली ही काया
(नाही मजला जगायचे)
अत्यंत प्रिय व्यक्तीच्या प्रोत्साहनने जीवन कसे बहरते हेच यातून व्यक्त होते तसेच त्यांच्याविना जीवन कसे शुष्क होते याही भावना इथे प्रकट होतात. सगे सोयरे कोण असतात, का असतात, त्यांची जीवनातली महत्त्वपूर्ण भूमिका यांचे अर्थ प्रत्येक गीतात वाचायला मिळतात. मातृत्वाची सर्वंकष महती सांगणाऱ्या गीतरचना नारी जीवन विभागात वाचताना धन्य तो नारी जन्म आणि नारी जन्माचा सन्मान व्हायला हवाच असे वाटते आणि असाच संदेश देणाऱ्या रचना यात आहेत. या गीतांमधून नारित्व, स्त्रीत्व या संज्ञांचा अतिशय नेमकेपणाने अर्थ उलगडलेला आहे. त्याचबरोबर नारीचा झालेला अनादर, तिच्या देहाची विटंबना याविषयीची चीडही कवीने व्यक्त केलेली आहे.
धुक्यापरीही धूसर झाली
पावन सारी नाती
मोल न काही लेकीला ती केवळ पैशापोटी
विश्वासाचे धामही झाले काटेरी पिंजरा
छाया ही नच नाही मृगजळ नसे कुठेही थारा..
(बावरलेली जखमी हरणी)
विश्वासाचे धामही झाले काटेरी पिंजरा ही शब्दपंक्ती मनावर खरोखरच आघात करते. आणि जगाचा एक कडवट वास्तव अनुभव देते. समाजात घडत असणाऱ्या स्त्री अत्याचारांची कवीने सखेद दखल घेतलेली आहे.
या सर्वच काव्यातून कवीचे एक सामाजिक, संवेदनशील, विशाल, बांधील मन जाणवते.
एकंदरच निशिगंध हा सर्व विषय स्पर्शी गीत संग्रह आहे. मानवी जीवन, माणूस टिपणारा आहे. प्रत्येक गीतात मौल्यवान असा विचार मांडलेला आहे. शिवाय या सर्वांतून कवीचा त्या त्या विषयावरील अभ्यास, निरीक्षण, संवेदना, सहअनुभूती आणि भाषेची अत्यंत मजबूत पकड जाणवते. मुख्य म्हणजे कुठेही विचारांचा गोंधळ नाही. स्पष्टता आहे. प्रत्येक ओळ गतीत वहात वहात रसिकांच्या मनात अलगद फुटते. शिवाय या सर्व गीतांमधून एक काव्यधर्मही त्यांनी जपलेला आहे. ऊपमा, उत्प्रेक्षा, लयबद्धता, गेयता, सहज यमके यामुळे काय वाचू, किती वाचू आणि किती वेळा वाचू अशीच वाचकाची मनस्थिती होते. काही कविता अवघड भासतात, पटकन अर्थ लागत नाही, कवीला नेमके काय म्हणायचे आहे ते समजायला वेळही लागतो. पण तेच काव्य पुन्हा पुन्हा वाचलं की कवीच्या विचारांशी आपण जाऊन पोहोचतो आणि त्या वेळेला जो आनंद होतो तो शब्दातीत आहे.
“डॉक्टर निशिकांत श्रोत्री, इतका सुंदर गीत संग्रह सादर केल्याबद्दल धन्यवाद आणि अभिनंदनही.
(कंसात कवितेची शीर्षके दिली आहेत)
परिचय : राधिका भांडारकर पुणे.
पुणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मी आज श्रीमद् भागवत कथेचा जो भाग लिहीत आहे तो सर्वांच्या अत्यंत आवडीचा विषय आहे. आपण एकूण नऊ स्कंध वाचले. आजचा हा दशम स्कंध म्हणजे भागवत पुराणाचा आत्मा आहे. हा भाग पूर्णपणे श्रीकृष्णाच्या लीलांनी व्यापलेला आहे. रासक्रीडेचेही वर्णन रसभरीतपणे यात आहे. या पुस्तकाची सुरुवात लेखकाने गोपीगीताने केली आहे. हे गोपीगीत म्हणजे गोपींना श्रीकृष्णाच्या सहवासाचा गर्व झाला होता, तो दूर करण्यासाठी व त्यांना शुद्ध भक्तीचा धडा देण्यासाठी भगवंत गुप्त झाले. मग मात्र गोपी विराहाने वेड्या झाल्या. सर्व चराचरसृष्टीत श्रीकृष्ण कोठे आहे म्हणून विचारीत फिरत राहिल्या. निराशेने कालिंदीकाठी बसून श्रीकृष्णाची त्यांनी आर्त विनवणी केली. दशम स्कंधातील हा भाग गोपीगीत म्हणून प्रसिद्ध आहे. तो कृष्णा वरील अनन्य भक्तीचा एक उत्तम ठेवा आहे. एकूण एकोणीस संस्कृत श्लोकांच्या, गेय असणाऱ्या गोपीगीताने या पुस्तकाची सुरुवात होते.
पुढे मात्र संपूर्ण श्रीकृष्ण चरित्र आहे. पहिली कथा वसुदेव देवकीच्या विवाहाची आहे. मागील स्कंधात शुकाचार्यांनी परीक्षित राजाला यदुवंशाचा विस्तार सांगितला होता. तेव्हा परीक्षिताने पुढील वृत्तांत जाणून घेण्यासाठी शुकाचार्यांना काही प्रश्न विचारले की, माझे आईच्या गर्भात अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्रापासून संरक्षण कसे झाले? कंसाला देवाने का मारले? त्याचे आयुष्य, पत्नी वगैरे वगैरे!! त्यानंतर शुकाचार्य परीक्षिताला श्रीकृष्ण चरित्राचे कथन करतात. दानवांच्या भाराने पृथ्वी व्यथित झाली.. ती गायीचे रूप घेऊन ब्रह्मदेवांकडे गेली. सर्वांनी मिळून भगवान श्रीविष्णूंची प्रार्थना केली. तेव्हा आकाशवाणी झाली की शेष आदिमाया यांच्यासह भगवंत स्वतः वसुदेवाच्या पोटी अवतार घेणार आहेत.. सर्व देवांनी व देव स्त्रियांनी यदुकुलात गोपगोपींच्या रूपात अवतार घ्यावा, असे ब्रह्मदेवाने त्यांना सांगितले.
वसुदेव देवकीचा विवाह झाला. त्यांच्या रथाचे सारथ्य देवकीचा बंधू कंस मोठ्या आनंदाने करीत होता. एवढ्यात आकाशवाणी झाली की “याच देवकीचा आठवा गर्भ तुझा काळ बनणार आहे” हे ऐकून कंसाने ताबडतोब वसुदेव व देवकीस बंदीवासात ठेवले. त्यांची मुले जन्मतःच कंसाला आणून द्यायचे वचन कंसाने वसुदेवाकडून घेतले. पहिल्या मुलाचा जन्म झाला तेव्हा प्रामाणिकपणे वसुदेव मुलाला घेऊन कंसा कडे आला. पण कंसाने सांगितले की “या मुलाला घेऊन जा परत. तुझा आठवा मुलगा मला मारणार आहे.” वसुदेव आनंदाने परत गेला. पण मग कंसाचे सगळे अपराध भरणे आवश्यक होते. म्हणून नारद मुनी त्याला म्हणाले की “देवकीच्या पोटी येणारा कोणताही मुलगा विष्णूचा अंश असू शकतो”. मग मात्र कंसाने देवकीची मुले जन्मतःच मारून टाकली. अशी सहा मुले त्याने मारली.. सातव्या वेळी योगमायेने यशोदेच्या गर्भात प्रवेश केला. शेषाने रोहिणीच्या पोटी अवतार घेतला. तो बलराम!!
आठव्या वेळी मात्र भगवंताने देवकीच्या पोटी जन्म घेतला त्या वेळचे सृष्टीतील बदलांचे सर्व रम्य वर्णन लेखकाने केले आहे. ते प्रत्यक्ष वाचायलाच हवे.. वसुदेवाने तो अंश गोकुळात नंदाघरी नेऊन ठेवला व यशोदेची नवजात मुलगी देवकी पुढे आणून दिली. तिला धरून कंस तिला शिळेवर आपटणार इतक्यात ती योगमाया त्याच्या हातून निसटली. कंसाला उपदेश करून ती अंतर्धान पावली. नंतर श्रीकृष्ण यशोदेच्या मायेत गोकुळात वाढू लागला. असंख्य लीलांनी त्याने गोकुळाला तोषविले. ते सर्व वर्णन पुस्तकात आले आहे. कंसालाही समजले की आपला शत्रू कुठेतरी अवतीभवतीच्या गावात वाढतो आहे. त्याने पूतना या राक्षसीला सर्व गावातील लहान मुले मारून टाकण्याची आज्ञा दिली. ती रूप पालटून गोकुळातच आली. श्रीकृष्णाने तिचे स्तनपान करताना तिचे रक्त व प्राणही प्राशन केले. तिला नंतर मुक्ती ही दिली. यानंतर शकटासूर तृणावर्त वगैरे राक्षसांचे वध ही कृष्णाने युक्तीने केले. पुढची कथा बलराम व कृष्णाच्या नामकरणाची आहे. ती अगदी रसाळ कथा आहे.
यशोदेने खोड्या करणाऱ्या कृष्णाला उखळाला बांधले. त्याच उखळांना दोन झाडांच्या मधून ओढत नेऊन कृष्णाने शापित रुद्र सेवकांचा उद्धार केला. ते वृक्ष म्हणजे नारदांच्या शापाने वृक्ष बनलेले रुद्र सेवक- कुबेराचे मुलगे होते. पुढची कथा सर्व गोकुळ वासियांचे वृंदावनात स्थलांतर, अघासुराचा वध यासंबंधी आहे. ब्रह्मदेवांनीही कृष्णाची परीक्षा पाहण्यासाठी गाई गुरांना व गोपांना पळवून नेले. तेव्हा कृष्णाने जेवढी गाई गुरे व गोपाळ होते तेवढी रूपे धारण केली. याआधी सर्व गोपाळांसमवेत बलराम व कृष्णाने केलेल्या गोपाळकाल्याचा व भोजनाचा अतिशय सुंदर कथाभाग लेखकाने वर्णन केला आहे. पुढे ब्रहमदेवानेही श्रीकृष्णाची परीक्षा पाहण्याचे ठरविले. गाई वासरे व गोपाळ परत पाठवले आणि त्यांनी श्रीकृष्णाची स्तुती केली धेनुकासुर या दैत्याच्या वधाच्या नंतर देवांनी कृष्णावर पुष्पवृष्टी केली, ती कथा आली आहे.
यानंतरचे कालिया मर्दनाचे अतिशय सुंदर वर्णन लेखकाने केले आहे. कालियाचा पूर्वेतिहासही पुढे आला आहे. प्रलंब राक्षसाचा वध, श्रीकृष्णाने जंगलातील वणवा प्राशन केला, गोपींनी श्रीकृष्णाचे गुणवर्णन केले, गोपींनी कृष्ण हा पती म्हणून लाभावा म्हणून केलेले कात्यायनी व्रत, विप्रस्त्रियांवर श्रीकृष्णाने अनुग्रह केला वगैरे छोट्या कथा आल्या आहेत. यापुढची कथा मात्र इंद्राचा क्रोध, गोवर्धन पूजा, श्रीकृष्णाने गोवर्धन उचलून इंद्राचे गर्वहरण केले. ही रसाळ कथा लेखकाने सुंदररीत्या वर्णिलेली आहे. कृष्णाने महावृष्टीतून ब्रज स्त्रियांचे, व्रजवासीयांचे रक्षण केले तेव्हा इंद्राने कृष्णाची क्षमा मागितली. इंद्राने आकाशगंगेच्या जलाने व कामधेनूने दुग्धाने कृष्णाला सर्वाधीश म्हणून अभिषेक केला व त्याला गोविंद असे नाव दिले.
पुढचा कथा भाग हा रासक्रीडेचे रसभरीत वर्णन आहे. गोपींचे गर्वहरण, गोपी गीत, या कथा फारच छान आहेत. शंखचूडाच्या वधाची कथा त्यातच आहे.वृषभासुर,केली, व्योमासुर इत्यादी कंसाने पाठवलेले दैत्य कृष्णाने मारले. त्यामुळे कंस अस्वस्थ झाला. त्याने अक्रूराला पाठवून कृष्णाला मथुरेत पाचारण केले. अक्रूर बलराम, कृष्णाला घेऊन गेला. तिथे कृष्णाने कुब्जेचा उद्धार केला. या कथा सतत वाचत राहाव्या असे वाटते. कृष्णाने कंसाच्या निमंत्रणानुसार आखाड्यात प्रवेश करून प्रथम कुवलयापीड या मत्त हत्तीचा वध केला. मुष्टिक, चाणूर यांचाही वध केला आणि सर्वात शेवटचे वर्णन आहे ते कंसवधाचे!!!! प्रत्यक्ष वाचायलाच हवे .
मग श्रीकृष्ण आपल्या जन्मदात्या मात्यापित्यांना भेटले. मातामह उग्रसेन यांना कृष्णाने राज्यावर बसविले. मग ते दोघे बंधू सांदिपनी ऋषींच्या आश्रमात शिक्षणासाठी गेले . चौसष्ट दिवसात चौसष्ट विद्या आत्मसात करून त्या दोघांनी गुरुदक्षिणा म्हणून गुरूंना त्यांचा प्रभासक्षेत्री समुद्रात बुडून मेलेला मुलगा परत आणून दिला. हा ही कथा भाग खूपच छान आहे. तसेच अक्रूराला त्यांनी गोकुळात पाठवले. तिथली अवस्था काय आहे हे जाणून घेतले ..तेव्हाचे कृष्ण नसलेल्या गोकुळाचे वर्णन अगदी व्यथित करणारे आहे. नंतर कृष्णाने उद्धवावर अनुग्रह केला. ती कथा आहे. नंतर कुंतीची व धृतराष्ट्राची हस्तिनापुरला जाऊन भेट घेतली. तिथे त्याने धृतराष्ट्राला कृष्णाचा उपदेश सांगितला की “सम बुद्धीने वागावे” वगैरे!! पण धृतराष्ट्राने ते ऐकले नाही. तेव्हा अक्रूर परत मथुरेला गेला आणि त्याने धृतराष्ट्राचे वर्तन श्रीकृष्णाला सांगितले. इथे दहावा स्कंध समाप्त होतो. तसाच पाचव्या दिवसाचा कथा भागही संपतो.
पाचव्या दिवसाच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर श्री विष्णूंच्या रत्नखचित किरीटाचे चित्र आहे. किरीट व मुकुट वेगळे असतात किरीट हा निमुळता, शिखरासारख्या आकाराचा तर मुकुट त्रिकोणी असतो. श्रीविष्णूंच्या मस्तकी दोन्ही दिसतात. त्याचे वर्णन श्री शंकराचार्यांनी केले आहे.
सारांश — 100 सूर्यांच्या तेजाप्रमाणे तेज असलेले, संसार सागरातून बाहेर काढणारे आणि कलिकालाचा अंधार दूर करणारे श्री विष्णूचे हे किरीट आम्हाला शाश्वत सुख ( मोक्ष )देवो.
☆ “प्रेरणादायी पुस्तके” – लेखक : श्री सुबोध जोशी ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
सर्वसाधारणपणे आपण एका वेळेला एक पुस्तक वाचतो. काही लोकांना वेगळ्या विषयांवरील दोन पुस्तके आलटून पालटून वाचायची सवय असते. पण एकाच वेळेला, एकाच पुस्तकात नऊ पुस्तकांचा खजिना सापडला तर ? ही किमया केली आहे सांगलीचे प्रा.सुबोध अनंत जोशी यांनी.
श्री.सुबोध जोशी सरांचे ‘प्रेरणादायी पुस्तके ‘ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले व वाचायलाही मिळाले. आयुष्याला प्रेरणा देणा-या व व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणा-या नऊ पुस्तकांचा परिचय या एकाच पुस्तकात करुन देण्यात आला आहे. एका लेखमालेच्या निमित्ताने लिहीलेले हे लेख आता पुस्तकाच्या स्वरुपात आपल्यासमोर आले आहेत. भारतीय लेखकांनी इंग्रजीत लिहीलेल्या नऊ पुस्तकांचे सविस्तर विवेचन या पुस्तकात करण्यात आले आहे. मुख्यतः प्रेरणा देणारी व वाड्मयीन मूल्य असलेली पुस्तके यासाठी निवडण्यात आली आहेत. ही पुस्तके व त्यांचे लेखक खालीलप्रमाणे.:—
1 You Can Win…. शिव खेरा
2 You Are Unique…. डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम
3 Smile Your Way To… Accomplishment and Bliss… कमरुद्दीन
4 The Best Thing About…. You Is You…अनुपम खेर
5 Count Your Chickens … Before They Hatch… अरिंदम् चौधरी.
6 Secrets of Happiness… तनुश्री पोडेर
7 “The Heads – We Win; ” The Tails – We Win”… कर्नल पी.पी.मराठे
8 Winners and Losers… उज्वल पाटणी
9 The Tao of Confidence… एरी प्रभाकर
श्री.जोशी यांनी या नऊ पुस्तकांचा परिचय करून दिला आहे. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर हे पुस्तकांचे परीक्षण नाही, तर पुस्तकाच्या सर्व अंगोपांगांचे रसग्रहण आहे. या पुस्तकांच्या परिचयाशिवाय पुस्तकातील वाड्मयीन सौंदर्यही त्यांनी दाखवून दिले आहे.
या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लेखकाने आपल्या प्रस्तावनेत काही मुद्द्यांवर चर्चा केली आहे. प्रेरणा किंवा प्रेरक शक्ती म्हणजे काय ? प्रेरणाविषयक सिद्धांत, फ्राईड यांचा जीवनप्रेरणा-मृत्यूप्रेरणा सिद्धांत, मॅस्लोने यांची गरजांची क्रमवारी, अशा अनेक संकल्पनांचा उहापोह प्रस्तावनेत केला असल्यामुळे, मूळ पुस्तकांतील विविध लेखकांचे विचार समजून घेण्यास मदत होईल हे नक्कीच. उत्तम व्यक्तिमत्त्व संपादन करून परिपूर्तता गाठणे हे अंतिम ध्येय कसे गाठता येईल याविषयी मार्गदर्शन करणारी ही पुस्तके आहेत. ‘व्यक्तिमत्त्व विकास’ आणि ‘भारतीय परंपरेतील आत्मशोधन’ यातील साम्यही लेखकाने दाखवून दिले आहे. प्रेरणादायी पुस्तक म्हणजे यशाचा शाॅर्टकट नव्हे हे लक्षात ठेवून जो याचे वाचन करेल त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधणे सहज शक्य होईल, असा विश्वास लेखकाने शेवटी व्यक्त केला आहे.
पुस्तकांचा परिचय करुन देत असताना लेखकाने प्रत्येक पुस्तकातील महत्वाचे मुद्दे वाचकासमोर ठेवले आहेत. त्यामुळे मूळ पुस्तकांतील मुद्देसूदपणा लक्षात येतो. तसेच आपल्या मनातील अनेक संकल्पनांविषयी असलेला गोंधळ, गैरसमज दूर होण्यास मदत होईल असे वाटते. त्यामुळे श्री.जोशी सरांच्या या पुस्तकाच्या वाचनानंतर त्यांनी सुचवलेली पुस्तके वाचणा-यालाच संपूर्ण ‘फळ’ मिळेल, हे मात्र नक्की.
या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य त्याच्या निर्मितीत दडले आहे. प्रा.सुबोध जोशी यांनी जी लेखमाला लिहिली होती, ती कल्याण येथील प्रा.मुकुंद बापट यांच्या वाचनात आली व या मालिकेचे रुपांतर पुस्तकात व्हावे असे त्यांना वाटले. प्रा.जोशी यांनी तशी परवानगी देताच या पुस्तकाचा जन्म झाला. परंतु विशेष असे की श्री. बापट सरांनी प्रकाशन खर्च स्वतः केला व लेखक प्रा.जोशी यांनी कोणतेही मानधन घेतलेले नाही. हे पुस्तक खाजगी वितरणाद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे व लोकांना जीवन घडवण्यासाठी प्रेरणा मिळावी या एकाच हेतूने हा ज्ञानयज्ञ प्रज्वलित केला आहे.
… हे सुद्धा प्रेरणादायीच नाही का ?
पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ बाल साहित्य – “कुछ समझे बच्चमजी ?” – लेखिका : सुश्री वर्षा चौगुले ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
पुस्तक कुछ समझे बच्चमजी ?
लेखिका वर्षा चौगुले
प्रकाशक अक्षरदीप प्रकाशन
पृष्ठे 72
मूल्य 70/
वर्षा चौगुले यांचं ‘ कुछ समझे बच्चमजी ‘ हे पुस्तक नुकतंच वाचनात आलं. पुस्तकाच्या नावावरूनच लक्षात येईल की हे पुस्तक बालगोपालांसाठी आहे. वर्षा चौगुले यांनी विपुल बाल साहित्य लिहिले आहे. तसेच बाल साहित्य चळवळीतही त्या सक्रिय असतात.त्यामुळे मुलामुलींशी संवाद साधणे त्यांना छान जमते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे पुस्तक !
जिज्ञासा हे बालमनाचे वैशिष्ट्य आहे. त्यांना सतत कसले ना कसले प्रश्न पडलेले असतात. हे असंच का, ते तसंच का, असे प्रश्न त्यांची पाठ सोडत नाहीत. शिवाय आपण लहान असलो तरी आपण ‘तितके काही’ लहान नाही असा एक समज असतो. त्यामुळे ती सारखी स्वतःची तुलना मोठ्यांबरोबर करत असतात. त्यामुळे त्यांना काही सांगायला जावं तर पटेलच याची खात्री नसते. शिवाय त्यांच्या वयाचे असे काही खास प्रश्न किंवा समस्या असतात. काही सांगायला जावं तर फारच उपदेश करताहेत असं वाटतं. काही सांगू नये म्हटलं तर त्यांच्या चुका कशा सुधारणार ? त्यांना चांगल्या सवयी कशा लावणार ? त्यामुळे बालक आणि पालक या दोघांमध्ये सुसंवाद कसा साधायचा हा एक प्रश्नच असतो. पण या प्रश्नाचं उत्तर हे पुस्तक वाचल्यावर मिळतं. मुलांना समजून घेऊन, त्यांच्याच भाषेत, कधी गोड बोलून, कधी एखादी गोष्ट सांगून, तर कधी एखादे उदाहरण देऊन त्यांना समजावून सांगितले तर ते त्यांनाही पटते. मग त्यांच्या मनातील शंका आणि गैरसमज दूर होतात. हे सगळं पटवून देणारं हे पुस्तक !
मुलांना अभ्यासाचा कंटाळा तर येतोच. पण अन्य काही वाचा म्हटलं तर तेही नको असतं. खाण्याच्या बाबतीत आवडीनिवडी असतात. स्वच्छता, टापटीप, शिस्त हे सगळे नावडते विषय. शिवाय मोठ्यांच्या गरजा, फॅशन्स यावरही त्यांचं लक्ष असतं. पाठांतर टाळणे, टीव्ही बघणे ,चांगलं वाईट यातला फरक न कळणे, यासारखेही प्रश्न असतातच. ते सोडवायचे असतील तर त्यांच्याशी गप्पा मारल्या पाहिजेत, संवाद साधला पाहिजे. तो कसा साधावा ते हे पुस्तक वाचल्यानंतर पालकांना समजू शकेल. तसेच मुलांच्या मनातील गैरसमज हे पुस्तक वाचल्यावर नक्कीच दूर होतील. अशाप्रकारे पालक व पाल्य असे दोघांनाही उपयुक्त असे हे पुस्तक आहे.
मुलांना समजावून सांगत असतानाच नकळतपणे संस्कार होत असतात. संस्कारक्षम वयातील ‘बच्चमजी’ सहज समजू शकतील असे हे पुस्तक त्यांनी अवश्य वाचावे असे आहे. हातात छडी न घेता वर्षा चौगुले यांनी शिक्षिकेची भूमिका उत्तमपणे पार पाडली आहे.
पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈