मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆‘कोरडा भवताल’ – श्री आनंदहरी ☆ परिचय – श्री रमेश नागेश सावंत

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘कोरडा भवताल’ – श्री आनंदहरी ☆ परिचय – श्री रमेश नागेश सावंत ☆ 

कवितासंग्रह – कोरडा भवताल

लेखक : आनंदहरी 

प्रकाशक : प्रभा प्रकाशन, कणकवली

पृष्ठसंख्या : ८४

कोरडा भवताल —- जगण्याच्या मुळाशी भिडणारी कविता

कवी आनंदहरी यांच्या ‘ कोरडा भवताल’ या नव्या कवितासंग्रहातील कविता भवतालात घडणा-या घटितांवर लक्ष्यवेधी भाष्य करतात. आनंदहरी यांच्या संवेदनशील दृष्टीला जाणवलेले जगण्याचे भान त्यांच्या कवितांतून संयत भाषेत व्यक्त झाले असले तरी या कविता वाचकाच्या संवेदनशील मनाच्या तळाचा ठाव घेणा-या आहेत. ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉ.गोविंद काजरेकर यांनी त्यांच्या विश्लेषक प्रस्तावनेत नमूद केले आहे की कवी आनंदहरी समकाळाची स्पंदने टिपण्यात यशस्वी झाले आहेत. आपला भवताल कोरडा असल्याची कवीची जाणीव ही अभावाची आहे आणि त्यामुळे त्यांच्या कवितेतून जगण्यातील अर्थशून्यता निदर्शनास येते. म्हणूनच सामान्य माणसाच्या जीवनसंघर्षाचा वेध घेणारी ही कविता वर्तमान काळाचा अवकाश व्यापून टाकणारी आहे. कवी आत्मनिष्ठ कवितेच्या दिशेने वाटचाल करत असताना त्याच्या कवितेचा सूर सामाजिक निष्ठेकडे वळलेला दिसून येतो. ‘मी साधेच शब्द लिहिले’ या पहिल्याच कवितेत अव्यक्त राहिलेल्या माणसांबद्दल कविला वाटणा-या सहसंवेदनेची ही जाणीव तीव्रतेने प्रकट झाली आहे.

“फक्त लागावा असा लळा

की ज्याला व्यक्त होता येत नाही त्याच्यासाठीच

माझ्या कवितेचे शब्द बोलत राहावेत

आयु्ष्यभर”

समकालीन मराठी कवितेत रुजलेला सामाजिक जाणिवेचा स्वर कवी आनंदहरी यांच्या कवितेतूनही प्रखरतेने उमटतो. ‘दिशा ‘ या कवितेत कविच्या सामाजिक अनुभूतीचे व्यामिश्र रंग उमटले आहेत.

भिरभिरलो दाहीदिशी आणि उतरलो धरेवर

सारा आसमंत कवेत घेऊन

आणखी कुणाच्याही दिशा

हरवून जाऊ नयेत म्हणून

कवीला त्याच्या आसपास दिसणा-या ‘ कोरड्या भवताला’ बद्दल वाटणारी संवेदना ‘आजचा काळ’, ‘वेदनेचे उठत राहतात तरंग’, ‘उपासमार’, ‘वासुदेव’, ‘मला माणूस म्हणू्न जगयाचंय’ या कवितांतून प्रकट झाली आहे. ‘आजचा काळ’ या कवितेतून कवीने सध्याच्या काळात मानवजातीवर घोंघावत असलेल्या असहिष्णुतेच्या वादळावर अतिशय मार्मिक शब्दांत आघात केला आहे.

वादळ कधीच करत नाही भेद

पाहत नाही रंग झाडापेडांचा, घरादाराचा आणि माणसांचाही

आजचा काळ असाच तर आहे असहिष्णुतेचा !

कोणत्याही कवीला शब्दांचा, प्रतिमांचा आणि प्रतिकांच प्रचंड सोस असतो. परंतु अल्प शब्दांत नेमक्या प्रतिमा वापरून आशयघन कवितेचे बिंब तयार करण्याचे कसब कवी आनंदहरी यांना जमले आहे. ‘ उपासमार ‘ या कवितेतून त्यांच्या काव्यगत प्रतिभेचे प्रत्यंतर येते.

तरीही मी राखलंय बियाणं शब्दांचं

रूजवू पाहतोय मनाच्या शेतात

निदान उद्या तरी डवरतील

शब्दांची कणसं

साध्या आणि सरळ भाषेत व्यक्त होतानाही मोठा आशय मांडणारी ही कविता थेट वाचकांच्या काळजालाच हात घालते. ‘ बांद’ या बोली भाषेत लिहिलेल्या गावरान बाजातल्या कवितेत ग्रामीण जीवनाचे चित्र कवीने आत्मीयतेने साकारले आहे. या कवितेतील ‘ बाप ‘ आणि ‘ आजा ‘ वाचकांना भावूक करून आठवणी चाळवणारा आहे.

आनंदहरी यांच्या कवितेची भाषा जितकी सहज, स्वाभाविक तितकीच त्यांची काव्यशैली देखील चिंतनशील प्रवृत्तीची आहे. त्यांच्या कविता जगण्याच्या मुळाशी भिडणा-या असून कविच्या भावना हळुवार शब्दांतून व्यक्त करतात. ‘ ऊनही आताशा’ या कवितेत एकीकडे निराशा आणि कोरडेपणा यांचे चित्रण करताना कविचा सूर भरपूर आशादायी असल्याचे जाणवते.

आशेची पाखरं

अवचितच झेपावतात आकाशात

आकाश पंखात घेण्यासाठी

रणरणत्या टळटळीत दुपारीही!

‘मला माणूस म्हणून जगायचं आहे’ या कवितेतून समाजातील दांभिक प्रवृत्तींचा वेध घेताना कवीने असामाजिक तत्वांवर शाब्दिक कोरडे ओढले आहेत. कवीचा आंतरिक आक्रोश हा जनमानसाचा प्रातिनिधिक आक्रोश आहे. सांप्रत काळात समाजमनावर पडलेला धर्माचा अतिरेकी प्रभाव आणि धर्माचे बदलते स्वरूप याबाबत कविने ‘ धर्म ‘ या कवितेतून प्रश्न उपस्थित केले आहेत. मुक्त छंदातील अशा सामाजिक भान प्रकट करणा-या कवितांबरोबरच ‘ मन वारकरी झाले’ , ‘ माझ्या देहाचे रे झाड’, ‘जन्म तुझा होता बाई’ , या अष्टाक्षरी कविता तसेच ‘ सुने झाले गाव’, ‘ दाटते मनात भय’, ‘लखलाभ तुम्हाला’ या गजला कविच्या बहुपेडी प्रतिभेची जाणीव करून देतात.

या कवितांतून सामाजिक जाणीव व्यक्त करताना कवीने स्त्रियांच्या व्यथा मांडण्याचे भानही जागृत ठेवले आहे. ‘ उसन्या अवसानाने ‘ आणि ‘ नि:शब्द कविता ‘ या कवितांतून पुरूषी अहंकाराची दासी झालेली आधुनिक स्त्री, ‘ ‘तोड’ या कवितेत दारि्द्यावर घाव घालणारी ग्रामीण स्त्री, आणि ‘ती म्हणाली, ‘ शेवटी तू ही पुरूषच’ , या कवितेतील मुक्तीसाठी आसुसलेली स्त्री, अशा स्त्रियांच्या नानाविध रूपांचे वेधक दर्शन कवी आनंदहरी यांनी घडविले आहे. या कवितासंग्रहातील कवितांचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये पाहता समकालीन मराठी कवितेच्या क्षेत्रात कवी आनंदहरी यांच्या कवितेची योग्य दखल घेतली जाईल ही आशा बळावली आहे.

प्रस्तुति – श्री रमेश नागेश सावंत

मुंबई

संपर्क – 9821262767

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘प्रवाहाविरुद्ध पोहताना’ – डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘प्रवाहाविरुद्ध पोहताना’ – डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ राधिका भांडारकर ☆ 

पुस्तकाचे नाव : प्रवाहाविरुद्ध पोहताना. (आत्मकथन)

लेखिका……..    डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी

प्रकाशक..         दिलीपराज प्रकाशन

पहिली आवृत्ती   फेब्रुवारी २०१५

पृष्ठे                    २४३

किंमत                २८०/—

प्रवाहा विरुद्ध पोहताना–हे लेखिका डाॅ.स्नेहसुधा कुलकर्णी यांचे आत्मकथन आहे..

पुस्तकाच्या शीर्षकावरुनच लक्षात येते की एका संघर्षाची कहाणी आहे.जीवन जगताना विलक्षण जिद्दीने ,मनाशी स्वप्ने बाळगून संकटांना कणखरपणे तोंड देत जगलेल्या एका स्वप्नाळु मुलीची ही काळीज चिरणारी ,पण धडपडीची जीवनकहाणी आहे.एक लांबलचक हर्डल रेसच..

लहान वयातच पितृछत्र हरपले.अकरा भावंडांचं कुटुंब,

अठरा विश्व दारिद्र्य.ऊपासमार. आजारपण.समाजाकडून  झालेली उपेक्षा.अवहेलना.सगळ्याच  आघाडीवरची अस्थिरता.या सार्‍यांशी वेळोवेळी लढून मात करुन ही मुलगी टिकून राहिली.

शाळेची सलग तीन वर्षे आजारपणामुळे बुडाली.त्या आजारपणाचे वर्णन वाचताना  मन अक्षरश: पिळवटते.

खाटेला खिळलेली ,भविष्यात कधी पायावर उभं राहून चालता तरी येईल का हाही प्रश्न असताना ,तिची जगण्याची धडपड आश्चर्यकारक वाटते.त्याविषयी लिहीताना लेखिका म्हणतात,

“रात्री सगळ्यांची निजानीज झाल्यावर मी आईच्या आधाराने उभी राहू लागले.पंधरा दिवसांनी काॅटला धरुन दहा पंधरा पावले चालून झाली आणि आशेला पालवी फुटली…मी बरी होऊ शकते असा विश्वास मिळाला..”

एकीकडे त्या असंही म्हणतात,माझ्यासारखी सामान्य माणसे दूरदृष्टीने वागत नाहीत.भावनेत वारंवार गटांगळ्या खातात.श्रद्धेवर व भावनेवर जगतात.कधी दैवाचे अनुकुल दान पडले की मूठभर ज्वारीचे दाणेही सुवर्ण मोहरा वाटू लागतात….”

त्यांच्या आयुष्याची सारी जडण घडण त्यांच्या या लेखनातून वाचायला मिळते.आयुष्याचा टप्प्या टप्याने आढावा घेताना लेखनातील सुसूत्रता कुठेही तुटलेली नाही…

प्रवाहा विरुद्ध आयुष्य घडवत असताना,सुरवातीला त्यांनी अनेक नोकर्‍या केल्या.आणि  शिक्षिका ,लेखिका ,कवयित्री ,प्रकाशिका ,विविध संस्थांवर पदाधिकारी …इतपर्यंतचे त्यांचे सविस्तर आणि अत्यंत प्रामाणिकपणे लिहीलेले हे लेखन उत्कंठावर्धक आणि वाचनीय आहे…वेळोवेळी थक्क करणारे आहे.

एक आगळंवेगळं ,शिस्तबद्ध,नीटनेटकं चोखंदळ व्यक्तीमत्व— याचीच ओळख यातून होते….

स्वप्नांची मोडतोड,अपेक्षाभंगांचे चटके ,वैवाहिक जीवनातले सुखदु:खांचे चढउतार,सहकार्याचे हात देणारेही नातलग,मित्रमंडळी यासोबत एक अडखळती पण यशाची वाट धरणारी अशी ही सकारात्मक दृष्टीकोणाची  संघर्ष कहाणी.

आयुष्यात कोणी गॉडफादर नाही ,कुणाचे प्रोत्साहन नाही तरीही शिक्षण आणि प्रकाशन व्यवसायात त्यांनी लक्षणीय यश मिळवलं…

पुण्यातले साहित्य वर्तुळात एका महिलेने चालवलेले “नीहारा “हे पहिलेच प्रकाशन असेल.!

लेखिका म्हणते,मी चारचौघींसारखीच धडपडणारी संसारी स्त्री आहे,पत्नी माता भगिनी या भूमिका वठवणारी सामान्य गृहिणी आहे.पण मी दुबळी नाही. मी बुद्धीने असामान्य,हजारात एक नाही पण मी अगदीच सर्वसाधारणही नाही. मी कुठे आहे,कशी आहे याचं नेमकं भान मला आहे. माझ्यात खूप उणीवा,कमतरता आहेत,पण प्रवाहपतित होउन  जगणं,मला मान्य नाही. तशी मी जगले नाही म्हणून माझं आयुष्य संघर्षमय झालं…..””

खरोखरच अजिबात रटाळ,पाल्हाळिक नसलेल्या आणि ओघवत्या शब्दशैलीतले हे डॉ.सुधाताई  कुलकर्णी यांचे आत्मकथन वाचताना,आयुष्यांतील संकटाशी,अडचणींशी झगडण्याची उमेद मिळते…हेच या लेखनाचे उद्दीष्ट्य सार्थ झाले असे म्हणायला हरकत नाही…..

 डॉ. स्नेहसुधाताईंना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!!

 

प्रस्तुती : सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ मोठी तिची सावली – श्रीमती मीना मंगेशकर खडीकर ☆ परिचय – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ मोठी तिची सावली – श्रीमती मीना मंगेशकर खडीकर ☆ परिचय – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

पुस्तकावर बोलू काही 

पुस्तकाचे नाव –‘मोठी तिची सावली’

लेखिका- श्रीमती मीना मंगेशकर खडीक

शब्दांकन-प्रवीण जोशी

आवृत्ती पहिली- २८ सप्टेंबर २०१८.

‘मोठी तिची सावली’

श्रीमती मीना मंगेशकर खडीकर लिखित ‘मोठी तिची सावली’ हे लतादीदींवर लिहिलेले पुस्तक अप्रतिम आहे! लतादीदींनी विषयी आपल्या मनात आदर, कुतूहल, कौतुक अशा असंख्य भावना आहेत, त्यामुळे हे पुस्तक वाचताना त्यांचं बालपण, त्यांना पडलेले कष्ट, कुटुंबासाठी त्यांनी केलेला त्याग अशा सर्व गोष्टी समजू लागतात, तरीही मीना ताई म्हणतात त्याप्रमाणे’ दीदी समजणे अवघड आहे’ वाचस्पती श्री शंकर अभ्यंकर यांची सुंदर प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे.

लतादीदींच्या गाणं कारकीर्दीविषयी आपण थोडाफार तरी ऐकलं वाचलं आहे पण मीनाताईनी लता दीदीं चे बालपण फार सुंदर रेखाटले आहे. डोळ्यासमोर खोडकर, खेळकर लतादीदी उभी करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. सांगलीमध्ये दीनानाथ मंगेशकर असताना या भावंडांचे बालपण अतिशय समृद्ध तेत गेले होते तिथे त्यांनी अनुभवलेला पहिला काळ आणि  ते वैभव गेल्यानंतर अनुभवलेले दिवस दोन्ही वाचताना खरोखरच भारावून जायला होते. प्रथम सांगली, नंतर पुणे, कोल्हापूर आणि मास्टर विनायक यांच्या कुटुंबाबरोबर मुंबई असे चार कालखंड या पुस्तकात वाचायला मिळतात.

वयाच्या तेराव्या वर्षी घराची जबाबदारी लतादीदींच्या अंगावर पडली पहिली मंगळागौर या चित्रपटाने लतादीदींनी भूमिका केली पण चेहऱ्याला रंग लावून सिनेमात काम करणे त्यांना आवडले नाही. 42 /43 च्या दरम्यान लतादीदी आणि मीनाताई प्रफुल्ल पिक्चर च्या लोकांबरोबर मुंबईला गेल्या. आणि त्यांच्या गायन कारकीर्दीला खरी सुरुवात ‘महल’ आणि ‘बरसात’या सिनेमातील पार्श्वसंगीतामुळे झाली. त्यानंतर दीदींनी मागे वळून पाहिलेच नाही. सर्व भावंडे एकमेकांना धरून ठेवण्यात दीदींचा मोठा वाटा होता. त्या खोडकर, मोकळ्या स्वभावाच्या, पत्ते खेळण्याची आवड असणाऱ्या, नकला करणाऱ्या, फोटोग्राफी आणि क्रिकेटमध्ये रस घेणाऱ्या

आहेत. या विविध पैलूंचे या पुस्तकातून आपल्याला दर्शन होते.

हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचे स्थान अढळ आहे.तसेच कोळी गीते, भक्तीगीते, भावगीते आणि विविध प्रकारची गाणी यात दीदींचा स्वर आपल्या ला कायमच आनंद देतो.शांता शेळके यांची अनेक गाणी दीदींच्या स्वरात आहेत.

हृदयनाथ मंगेशकर यांच्या गाण्यांना लतादीदींनी संगीत ही दिले आहे.संगितकार म्हणून ‘आनंदघन’ नावाने त्यांनी संगीत दिले.दिनानाथांच्या चीजांची वही

ही त्यांची खरी इस्टेट त्यांनी जतन केली आहे.

जिथे दु:ख भोगले त्याच सांगलीत मंगेशकर कुटुंबियांचा सत्कार केला तेव्हा  मागील सर्व दु:ख मागे सारून त्यांनी सांगलीकरांच्या आदरातिथ्याचा स्वीकार करून मनाचा मोठेपणा दाखवला!

दिनानाथांच्या नावे पुण्यात मोठे हाॅस्पिटल सुरू केले.तसेच माई मंगेशकर हाॅस्पिटलही उभारले.

लंडन च्या अल्बर्ट हाॅलमध्ये त्यांनी परदेशात पहिला जाहीर कार्यक्रम केला.

या पुस्तकात लतादीदींविषयी खूप छान माहिती प्रत्यक्ष त्यांच्या बहिणीकडून मिळत आहे.

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘विविधा’ (अनुवादित कथासंग्रह) – सौ. उज्ज्वला केळकर ☆ प्रस्तुती – सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘विविधा’ (अनुवादित कथासंग्रह) – सौ. उज्ज्वला केळकर ☆ प्रस्तुती – सौ राधिका भांडारकर ☆ 

पुस्तकाचे नांव….   विविधा (अनुवादित कथासंग्रह)

अनुवादिका –         सौ. उज्ज्वला केळकर

प्रकाशक               श्री नवदुर्गा प्रकाशन.कोल्हापूर

प्रथम आवृत्ती         जानेवारी २०१८

पृष्ठे…….               २६४

किंमत                   ४००/—

विविधा हा सौ. उज्ज्वला केळकर यांचा कथासंग्रह प्रस्तुत करताना त्या त्यांच्या मनोगतात म्हणतात,—” हिंदीमधील कथासाहित्य वाचताना काही कथा खूप आवडून गेल्या. त्यांच्या वेगळेपणाने त्या मनात रेंगाळत राहिल्या. त्यांचा मराठी अनुवाद करुन, मराठी वाचकांपर्यंत त्यांचे रंग गंध पोहचवावे असे वाटले. आणि त्यातूनच साकारला हा “विविधा” कथासंग्रह.” 

यातील काही कथा हिंदी भाषेतून थेट घेतलेल्या आहेत.

काही अन्य भाषांतून हिंदीत अनुवादित आहेत आणि त्यांचा मराठी अनुवाद केलेला आहे.

विविध वातावरण, विविध भवताल, विविध संस्कृतीचे दर्शन घडविणार्‍या, विविध भावभावनांचा खेळ मांडणार्‍या अशा एकूण एकोणावीस कथा या संग्रहात आहेत…

या कथा वाचताना,  तुटलेली मने, तुटलेली स्वप्ने, विखुरलेली नाती यातून नकारात्मकता जाणवत असली तरी वास्तवतेपासून कथा दूर जात नाही. ती रेंगाळते. विचार करायला लावते. सीमारेषेवरील युद्धे,जाती धर्मामुळे झालेल्या दंगली, स्वार्थी मतलबी राजकीय खेळी, खोटेपणा, भ्रष्ट नीती या सर्वांचा सामान्य निरपराध जनमानसावर किती खोल आणि उध्वस्त करणारा परिणाम होतो याची जाणीव या कथांमधून बोचत राहते.

काही कथांमधे हळुवार प्रेमाचे, नात्यागोत्यांचे, पारिवारिक विषयही अतिशय वेगळेपणाने आणि विविध स्तरांवर हाताळले आहेत. म्हणून त्यात तोचतोचपणा नाही. ते नेहमीचेच न वाटता त्यातलं निराळेपण वाचकाला वेगळ्या जाणीवा देतात.

‘पुष्पदहन’ ही युरोपहून आॅस्ट्रेलियात अपहरण करुन अमानुष छळ झालेल्या एका मुलाच्या जीवनावरची कहाणी आहे. लेखकाची या एकाकी व्यक्तीशी, एक टॅक्सी ड्रायव्हर आणि गिर्‍हाईक या नात्यातून जवळीक होते. जिम त्याला त्याच्या फसवणुकीची कहाणी सांगतो. युद्धानंतर झालेली फरपट, जिमची आईशी झालेली फसवणुकीची  ताटातूट, हे सारं खूपच यातना देणार.!!

आॉस्ट्रेलियात तीन महिन्यासाठी संशोधनानिमीत्त आलेला लेखक जीममधे गुंततो. इंग्लंडमधे गेल्यावर “तुझ्या आईचा शोध घेईन..” असे वचन तो त्याला देतो. मात्र आई सापडत नाही. एका वादळात कोलमडलेल्या वृक्षाखाली सापडून जीमचाही मृत्यु होतो. याच वृक्षाशी जीमचे घट्ट नाते असते. हा वृक्ष आणि मी दोघेही एकाकी असे तो सांगायचा. वृक्ष कोलमडतो आणि जीमची जीवनयात्रा संपते…. ही शोकांतिका असली तरी धार्मिक, वांशिक क्रौर्याची वास्तववादी कथा आहे…. महेंद्र दवेसर हे या कथेचे मूळ लेखक.

‘कहाणी एका रात्रीची‘…. या कथेत पाकीस्तानात मागे राहिलेल्या अल्पसंख्याकांच्या शोचनीय स्थितीचे दर्शन होते. जबरदस्तीचे धर्मांतर, झालेल्या रश्मी चावलाचा रेश्मा कुरेशी बनून घडलेला दु:खदायक जीवनप्रवास वाचताना मन कळवळते… एका हिंसक, राजकारणी घटनेच्या बळीची ही कथा शोचनीय आणि वाचनीय आहे….

‘राक्षस‘ ही कथा वाचताना डोळे नकळत भिजून जातात. सुकांत गंगोपाध्याय यांची ही मूळ बंगाली कथा. राणू मुखर्जी यांनी या कथेचा हिंदी अनुवाद केला आणि उज्ज्वलाताईंनी ही ऊत्कृष्ट कथा मराठीत आणण्याचे मोलाचे कार्य केले.. अनाथाश्रमातून पळून आलेल्या, रेल्वेस्टेशन हेच घर मानलेल्या जबाची ही  कहाणी.. भटकी कलंदर मुक्त पण अतिशय कणखर मजबूत मनाची ही रांगडी राकट जबा—  शनवर घडत असलेल्या रितसर, बेकायदेशीर अगदी चोरीच्या कामातही यथाशक्ती हिरीरीने मदत करुन, मोबदला मिळवून गुजारा करणारी जबा– जांभळं, करवंदे निंबाची पाने विकून पैसे मिळवणारी जबा— स्टेशनवरचाच बलराम तिच्यावर लेकीप्रमाणे माया करतो… रोजचे प्रवासीही तिला करुणा माया दाखवतात. या जबाच्या ओसाड आयुष्यात बिसला नावाचा,चोरीच्या कोळसा खाणीत काम करणारा युवक प्रीतीचा मळा फुलवतो…जबा लग्न, संसार ,परिवाराची स्वप्नं पाहते…. लग्नाच्या अदल्या दिवशीच कोळशाच्या खाणीत झालेला अपघात आणि होरपळलेलं जबाचं स्वप्न वाचता वाचता डोळे वहात रहातात…ही कथा वाचताना रांगडी जबा, ते स्टेशन आजुबाजुचा परिसर, बलराम, बिसला ,या व्यक्ती सारंसारं अक्षरश: डोळ्यासमोर उभं राहतं…त्या वातावरणाचा एक भागच बनून जातो आपण…ती कथा नुसती वाचतच नाही तर ती उलगडणार्‍या शब्दांतून पहात जातो…

खरं म्हणजे प्रत्येकच कथा वाचताना मी हे अनुभवलं.!’

‘छब्बे पाजी‘ ही ही अशीच मुलांना सुरस कथा सांगणार्‍या साध्या सरळ पंजाबी माणसाची गोष्ट. हिंदु शीख दंगलीत विनाकारण आतंकवाद्याचा शिक्का बसून गुन्हेगारीच्या बेडीत अडकलेल्या निर्मळ मनाची कथा—-छब्बे पाजी जेव्हां म्हणतात,”आता माझ्या सगळ्या कहाण्या मेल्यात…कहाण्यांचा समुद्र पार सुकून गेलाय…”हे वाचताना आपल्याही मनातले अनंत प्रश्न ओले होतात….सुशांत सुप्रिय याच्या हिंदी कथेचा हा अनुवाद अप्रतिम!!!”

‘हॅलो १ २ ३ ४‘ ही संपूर्ण कथा म्हणजे एक फोनवरचा संवाद आहे. सुरवातीला निरर्थक वाटणारा मनोरंजक पण नंतर त्यातला  सखोल अर्थ जाणवत…वाचता वाचता एका एकाकी,नैराश्याने ग्रासलेल्या मनोरुग्णाचीच कथा उलगडत जाते…अतिशय धक्कादायक सुंदर वेगळ्याच विषयावरची ,निराळ्या पद्धतीने मांडलेली  कथा…मोहनलाल गुप्ता हे या कथेचे मूळ लेखक.

व्होल्गा यांची ‘ बहरे शिशीरात वसंत ‘ ही मूळ तेलगु कथा! आजारी वृद्ध आई आणि संसारी ,नोकरी करणारी लेक,यांच्या नात्याची विचीत्र वीण दाखवणारी कथा! या कथेत आई मुलीचा काहीसा गैरफायदा घेते ,तिला इमोशनल ब्लॅकमेल करते अशी भावना निर्माण होते.पण एक वास्तव म्हणून ते वाचकाला स्वीकारावही लागतं..

नीला प्रसाद यांची ‘ चंद्र माझ्या अंतरात ‘ ही एक विद्रोही कणखर विचारांची कथा अक्षरश:काळजावर चरे पाडते. यात विखुरलेल्या नात्यांचे तुकडे आहेत. प्रीतीची परिपक्वता आहे. निर्णयाची घालमेल आहे…एक सक्षम ठाम वैचारिक मानसिकता आहे. वैयक्तिक सुखाबरोबरच भोवतालच्या परिस्थितीचीही समंजस जाणीव आहे..या कथेतील काही वाक्ये थेट भिडतात—-

“दोन आत्मनिर्भर जीवांचं एकत्र जगणं,हे ह्रदयाचं नातं असतं. ते त्यांना एकत्र बांधून ठेवतं.  जर पतीचं मन इकडे तिकडे कुठे गुंतलेलंअसेल ,जाणूनबुजून तो आपल्या पत्नीचं मन तोडत असेल, तिचा मान ठेवत नसेल, तर विवाहाचं नातंच मृत होतं. पती जिवंत असूनही पत्नीच्या जाणीवेत ती विधवाच असते….!!!” अशी  विधाने प्रखर असली तरी ती नक्कीच विचार करायला लावतात…

सर्वच कथा सुंदर आहेत.मी काही कथांचाच आढावा घेतला कारण कथावाचनाचा आनंद स्वतंत्रपणे घेतला जावा ही भूमिका.

उज्ज्वलाताईंनी केलेले अनुवाद हे अस्सल आणि कथानकाचा गाभा,वातावरण ,संस्कृती चपखलपणे जपणारे आहेत..अनुवादात सहजता आहे..कुठेही कृत्रीमता ,ओढाताण लवलेशानेही नाही..उज्ज्वलाताईंची ही कला वादातीत आहे. प्रशंसनीय आहे.

थोडे शीर्षकाबद्दल—.विविध भाषेतील,विविध वातावरणातील,भिन्न संस्कृतीच्या निरनिराळ्या घडामोडींच्या या विविध कथा म्हणून “विविधा”…

हा संग्रह वाचतांना मन आनंदीत होत नाही मात्र सत्याच्या वास्तवतेच्या दर्शनाने एक प्रचंड हँगओव्हर येतो….कथांमधल्या नग्न नकारात्मकते पुढे वाचक भेलकांडून जातो…तसेच तो समृद्धही होतो.—–हे माझे मत—-

तुमचे मतही ऐकायला आवडेलच….

 

प्रस्तुती : सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ प्रकाशवाटा – डॉ. प्रकाश आमटे ☆ सौ. कल्पना मंगेश कुंभार

सौ. कल्पना मंगेश कुंभार

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ 

☆ प्रकाशवाटा – डॉ. प्रकाश आमटे ☆ सौ. कल्पना मंगेश कुंभार ☆ 

पुस्तकाचे नाव: प्रकाशवाटा

 लेखक : डॉ. प्रकाश आमटे

शब्दांकन : सीमा भानू

प्रकाशक : समकालीन प्रकाशन 

पृष्ठ संख्या : १५६ 

किंमत : रु. २००/-

परीक्षण :  सौ कल्पना कुंभार.

आजपर्यंत अनेक समाजसुधारक पाहिले..पण मनात अगदी खोलवर घर करून राहिले ते बाबा आमटे व डॉ .प्रकाश आमटे..त्यांनी आदिवासींच्या जीवनात आनंद तर निर्माण केलाच पण त्या आनंदाला भरारी मारण्याचे पंखही दिले…त्यांच्या पुस्तकाचे परीक्षण करण्याइतकी मी नक्कीच तेवढी जाणकार  नाही..पण जे भावलं ते तुमच्यासमोर मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न करत आहे..

डॉ. प्रकाश आमटे यांचे सीमा भानू यांनी शब्दबद्ध केलेले ” प्रकाशवाटा ” हे आत्मचरित्र वाचनात आलं आणि मी भारावल्यासारखी हेमलकशात  जाऊन पोहचले..पुस्तकाच्या मुखपृष्ठावर कंदील घेऊन डॉ. प्रकाश आमटे उभे असलेले आपल्याला दिसतात..जणू  ” कितीही अंधार असुदे..खाचखळगे असुदे..या कंदिलाच्या उजेडात ही वाट चालणारच आहे ” असे सांगत आहेत..तर मलपृष्ठावर बाबांसोबत व ताईसोबत  उभयंताचा फोटो आहे ..तो पहाताना त्यांचा साधेपणा मनाला भावतो..त्यांच्या चेहऱ्यावरील समाधानाच तेज ..व निस्वार्थी प्रेम  पाहून आपोआपच आपण नतमस्तक होतो त्यांच्यापुढे ….

प्रकाशाची वाट..

खडतर

          अवघड..

डोंगरदऱ्यांची

             वळणावळणाची

खाचखळग्याची..

तरीही बाबांचा विश्वास

 व ताईंची माया..   मंदाताई व प्रकाश दादांचा आत्मनिर्धार …

यामुळेच कुष्ठरोगी व आदिवासी समाज आज मानाने जगतोय..

ज्या वाक्यामुळे माझ्या बकेट लिस्ट मध्ये उर्वरित आयुष्य हेमलकशात  व्यतीत करायचे ही इच्छा मी लिहून ठेवली ते  म्हणजे.. डॉ .प्रकाश आमटे म्हणतात, ” हेमकशात आम्ही ज्या विपरीत परिस्थितीत काम करत होतो ते पाहून लोक आम्हाला वनवासातल्या राम सीतेची उपमा द्यायचे.पण मी तर म्हणतो , की सीतेला सोनेरी हरणाच्या कातड्याचा तरी मोह झाला.मंदाला मात्र कसलाच मोह कधीही झाला नाही ..अबोलपणे पण खंबीरपणे ती आयुष्यभर काम करत राहिली.” किती ही विरक्ती.. किती निरपेक्ष, निस्वार्थी भावना..मी क्षणांत नतमस्तक झाले त्या कुटुंबापुढे…” हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे..माणसाने माणसाशी माणसासम वागणे…”असा सेवाभाव नसानसांत भिनलेले हे आमटे कुटुंब..आजही तळागाळातील लोकांच्या सेवेसाठी तत्पर आहे..

आपला जीवनप्रवास उलगडताना अगदी प्रांजळपणे मनातले सगळे विचार ,भावना ,इच्छा ,स्वप्ने डॉ .प्रकाश आमटे आपल्यापुढे एकेक करून खोलत जातात…

‘मॅगसेसे ‘ चा आनंद  मध्ये ‘ अंधाराकडून उजेडाकडे ‘ वाटचाल चालू असताना ‘आशियाच नोबेल ‘ म्हणून ओळखला जाणारा मॅगसेसे पुरस्कार डॉ प्रकाश व मंदा आमटे या उभयतांना जाहीर झाला आणि लोकबिरादरी प्रकल्पाला बळ मिळालं.. याबद्दल सविस्तर लिहिलं आहे..१७ वर्षे ज्या भागात वीजच नव्हती तेथे आज ४० खाटांचं हॉस्पिटल आहे तिथे उपचार करून घ्यायला लांबून लांबून लोक येतात हे अभिमानास्पदच.  

 ‘आनंदवनातले दिवस ‘ मध्ये त्यांनी त्यांचं व त्यांचा भाऊ विकास यांच्यासाठी बाबा ‘ रोल मॉडेल ‘ कसे बनले? कळत नकळत कसे संस्कार रुजवले गेले..आणि कुष्ठरोग्यांवर उपचार करायला डॉक्टर जेंव्हा यायचे नाहीत तेंव्हा बाबा स्वतः त्यांच्यावर उपचार करत हे बघून डॉक्टर व्हायची इच्छा कशी निर्माण झाली.. याचे चित्रच  डोळ्यासमोर उभे केले आहे..

‘आनंदवनाबाहेरच्या जगात ‘ या भागात डॉ प्रकाश आमटे यांच्या शिक्षण..नागपूर मधील वास्तव्य.. मंदा ताईंची भेट..मेडिकल कॉलेज मध्ये त्यांची जुळलेली वेव्हलेंग्थ.. आणि दोघांचा आगळा वेगळा विवाह याबद्दल वाचताना आपणही त्या काळात पोहचतो..आणि मंदा ताईंबद्दल चा अभिमान डोळ्यात दाटून येतो..

यानंतर मुक्काम हेमलकसा, कसोटीचे प्रसंग ,विस्तारती वैद्यकीय सेवा, जीवावरचे प्रसंग, शाळेची सुरुवात , अनोखे प्रयोग ,प्राण्यांचं गोकुळ,पुढची पिढी,समाजमान्यता जगन्नाथाचा रथ असे विविध भाग वाचता वाचता आपण कधी हेमलकसातीलच एक होऊन जातो हे समजतच नाही..कसोटीचे व जिवावरचे प्रसंग वाचताना अक्षरशः अंगावर काटा उभा रहातो तर फोटो पाहताना अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी जे स्वप्न साकार केले त्याचा निश्चितच खूप अभिमान ही वाटतो…हेमलकसाचा प्रकल्प प्रत्यक्षात यावा यासाठी अनेक अनामिक कार्यकर्ते,कुष्ठरोगी देणगीदार ,स्नेही यांनी सहकार्य केले आहे.. आणि म्हणूनच हा ” जगन्नाथाचा रथ ” चाललेला आहे अशी प्रांजळ कबुली देणारे..अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे… आदिवासींच्या उन्नतीसाठी झटणारे..डॉ प्रकाश आमटे मला तर माणसाच्या रुपात असलेले देव च वाटतात..

काही माणसं 

वेड लावून जातात

गाभाऱ्यातल्या नंदादीपासारखी सतत हृदयात तेवत रहातात..

त्यांच हसणं ,त्यांच बोलणं

हृदयात कोराव वाटतं

साकार झालेल्या प्रतिमांशी 

जीवन जगावं वाटतं..

अशीच

काही माणसं . ..

आपलं आयुष्यच बदलून टाकतात…

माझं आयुष्य बदलणारे ..मला सकारात्मक दिशेला नेणारे ..माझ्या सामाजिक जाणिवा जागृत करणारे..आणि माझ्या मनातील हेमलकसा मध्ये जाऊन तिथे समाजकार्य करण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी  मनात भावना निर्माण करणारे हे पुस्तक ” प्रकाशवाटा ” सर्वांनी अगदी नक्की वाचा.

© सौ. कल्पना मंगेश कुंभार

इचलकरंजी

मोबाईल नंबर:9822038378

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ हनिमून आजी-आजोबांचा ☆ मनोगत – सौ.गौरी गाडेकर

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ 

☆  हनिमून आजी-आजोबांचा ☆ मनोगत – सौ.गौरी गाडेकर ☆ 

लेखिका – सौ.गौरी गाडेकर

प्रकाशक – मधुश्री प्रकाशन 

किंमत – रु 300 

लिंक >> हनिमून आजी-आजोबांचा! – मधुश्री प्रकाशन (madhushree.co.in)

सौ.गौरी गाडेकर

मनोगत 

नुकताच माझा , ‘हनिमून आजी-आजोबांचा’ हा विनोदी कथासंग्रह प्रसिद्ध झाला.

यातील सुरुवातीच्या काही कथांचे  नायक-नायिका आहेत आजी-आजोबा. अनेक वर्षांच्या सहजीवनानंतर नात्यामध्ये प्रेम आणि मतभेद यांचा सुंदरसा गोफ तयार होतो. ‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून गमेना,’अशी परिस्थिती होते . त्यातून निर्माण होतात असे गमतीदार प्रसंग. खरं तर आजी, आजोबांच्या दृष्टीने गंभीर असले तरी इतरांना हसवणारे.

नंतरच्या कथा इतर नात्यांच्या गुंते उलगडणाऱ्या.

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रसंगातून विनोदाचा पदर अलगद मोकळा करून हे कथाविश्व उभारलंय.

नेहमीच्या समस्याग्रस्त, धकाधकीच्या जीवनातील ताणतणावांवर उतारा  असणारं हे पुस्तक वाचकांच्या पसंतीला नक्कीच उतरेल, याची मला खात्री वाटते.

 

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆‘तरंग’ – सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆ परिचय – सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘तरंग’ – सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆ परिचय – सौ राधिका भांडारकर  

काव्यसंग्रहाचे नाव….तरंग

कवियत्री …… सुश्री अरुणा मुल्हेरकर

प्रकाशक……यशोदीप क्सक्सपब्लीxकेशन्स.पुणे.

प्रस्तुती …सौ. राधिका भांडारकर. पुणे.

प्रथम  आवृत्ती …..१ मे २०२१

 

पुस्तकावर बोलू काही—- “ तरंग “  

सुश्री अरुणा मुल्हेरकर यांचा *तरंग हा पहिलाच काव्यसंग्रह,प्रकाशित झाला आहे..प्रथम त्यांचे मनापासून अभिनंदन!!  

अरुणाताईंचा हा पहिलाच कवितासंग्रह  असला तरी त्यातील जवळ जवळ ४७/४८ कविता वाचताना प्रथम जाणवले,ती त्यांची वैचारिक उंची आणि शब्दांवरची घट्ट पकड. काव्यरचने विषयी असलेली त्यांची जाण….!!

त्यांच्या अंतरंगातून उमटलेल्या सर्वच कविता सरल आणि सहज आहेत…विनाकारण शब्दांची अनाकलनीय, बोजड वेटोळी नसून,कवितातल्या त्यांच्या भावना आणि त्या अनुशंगाने उलगडणारे अर्थ,वाचकांसमोर स्वच्छ सादर होतात.त्यामुळे त्यांची एकही कविता कंटाळवाणी वाटत नाही..सामान्य रसिक वाचकाच्या मनाला आणि बुद्धीला पटणार्‍या आणि झेपण्यार्‍या या कविता आहेत…ही माझी पहिली प्रतिक्रिया…

तरंग या कवितासंग्रहातल्या ४८कवितांची ,सुंदर शीर्षके असलेल्या विभागातून समर्पक मांडणी केली आहे. –जसे की,

भक्तीची वाट

निसर्ग माझा सखा

प्रेमरंग

मातीचे प्रेम

स्त्री

मन…

त्यामुळे वाचकाला सुरवातीलाच एक निश्चीत दृष्टीकोन सापडतो.सर्वसाधारणपणे कवी किंवा कवियत्रीच्या काव्यकृतीमागे, त्यांच्या नेमक्या कोणत्या भावना होत्या, कोणत्या अर्थाने,त्यांनी काव्यरचना केली असावी हे वाचकाला माहीत नसते.तो त्याच्या कल्पनेने ,बुद्धीने शब्दामागचे अर्थ लावत कविता वाचत असतो…कधी कवितेचा गाभा सापडतो तर कधी नाही सापडत…

पण अरुणा ताईंच्या कवितेतले विचार नेमके आणि स्पष्ट असून काव्यात्मक आहेत.त्यामुळे वाचक कवितेच्या प्रवाहाबरोबर आनंद घेऊ शकतो.हे या कवितांचे प्रमुख वैशिष्ट्य जाणवते.

भक्तीची वाट मधल्या ,”विट्ठला “असो…शिवमहिमा असो…अष्टविनायक महिमा…देवीची आरती .—.या सगळ्या कविता मनात एक भक्तीभाव घेऊन झिरपतात…

।।विट्ठला दास मी

  सेवक तव चरणांचा

  लागलीसे आस तुझ्या दर्शनाची।।

———ही आळवणी अंत:स्फूर्त भासते.

 

।।शिवा!चंद्र सूर्य पवन

    अनल तूच अससी

     जले तू आकाशी

      आणि अवनीवरती

      ॐनम:शिवाय।।

 

———-ही शिवस्तुती वाचताना महादेवाचे मूर्त स्वरुप उभे राहते…

 

प्रेमरंगमधल्या कविता ,खरोखरच निरनिराळ्या नात्यातल्या प्रेमाच्या रंगाची ऊधळण करतात.

..–त्या रेघोट्या पुळणीवरच्या

ती सागराची भरती

लहरीवर लहरी उठती

प्रीतीच्या उर्मी उसळती….

 

——–हे शब्द सहजपणे मनीच्या प्रेमभावना जाग्या करतात

“वंदन सैनिकास…”या कवितेतली वीर रसाची निर्मीती,

मीच गौरी मीच दुर्गा मधील स्त्री शक्ती,

“रे मनुजा..”मधील पर्यावरणासाठी ची हाक,

“पहाट”या कवितेतले ऊजळणारे आकाश,

आणि “आंबट वरण ” सारख्या हलक्या फुलक्या कवितेतून भासणारे हंसरे मन….

 

———–हे सारेच इतके बोलके आणि सजीव अनुभव आहेत की या सर्वच कविता

जणु आपल्याच होउन जातात..त्यांच्याशी आपल्या मनाचे नाते जुळते…

“तरंग” या कविता संग्रहात जशा “मुक्तछंद “कविता आहेत,तसेच काही मनोरंजक काव्यप्रकारही आहेत—यात शिरोमणी काव्य आहे.. दिंडी वृत्तातल्या कविता आहेत.निरनिराळ्या काव्यप्रकाराची ओळख अरुणाताईंनी त्यांच्या”तरंग”या काव्यसंग्रहात करुन दिली आहे….

प्रत्येक कवितेविषयी  लिहीणं मला योग्य वाटत नाही कारण वाचकांनीच एकेका कवितेचा आनंद स्वत: घ्यावा.मला जशा सर्वच कविता आवडल्यातशा त्या तुम्हालाही आवडतीलच याची खात्री आहे!!  अरुणाताईंच्या कवितेबद्दल आणखी एक आवर्जून सांगावेसे  वाटते..की त्या संगीतज्ञ असल्यामुळे, शब्द,सूर, लय, नाद याचा प्रभाव त्यांच्या काव्यरचनेत आढळतो.त्यांच्या कवितेत गेयता आहे.म्हणूनच त्यांची कविता “गीत” होते.

——पहिलाच पण वाचनीय ,दर्जेदार असा हा “तरंग””काव्य संग्रह ..यातील कविता मनावर तरंगत राहतात..

यशोदीप पब्लीकेशनचे श्री.निखील लंभाते आणि सौ.रुपाली अवचरे यांनी उत्कृष्ट मांडणी,अक्षर जुळणी, छपाईच्या माध्यमातून,त्यास देखणेपण दिले ही अभिनंदनीय बाब…!!

सुश्री उषा ढगे यांचे मुखपृष्ठ तरल,कलात्मक आणि अर्थपूर्ण.त्यांचेही अभिनंदन!!

असा हा परिपूर्ण, वाचनीय “तरंग” काव्य संग्रह—-

अरुणा मुल्हेरकर यांचे पुन:श्च अभिनंदन!!

आणि त्यांच्या भविष्यातील साहित्य प्रवासास मनापासून शुभेच्छा!! 

अशाच अनेक काव्यसंग्रहाची निर्मीती  त्यांच्याकडून होवो ही प्रभुचरणी प्रार्थना….

परिचय  : सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆‘काव्यमनीषा’ – सौ. मनीषा रायजादे-पाटील ☆ परिचय – श्री आनंदहरी

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘काव्यमनीषा’ – सौ. मनीषा रायजादे-पाटील ☆ परिचय – श्री आनंदहरी ☆ 

 

कवितासंग्रह – काव्यमनीषा

कवयित्री – सौ. मनीषा रायजादे-पाटील(९५०३३३४२७९)

प्रकाशन – साहित्य संपदा मुबंई

पृष्ठे –९६

किंमत – १३० रू .

——मातीशी, माणुसकीशी नाळ जपणारी कवयित्री मनीषा रायजादे यांची कविता

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुका म्हणजे खऱ्या अर्थाने आजही साहित्य पंढरी आहे.. ज्येष्ठ साहित्यिक चारुतासागर आणि ज्येष्ठ कवी गो.स. चरणकर यांच्या भूमीतील अनेक साहित्यिकानी आपला वेगळा ठसा उमटवून स्वतःच्या आणि या दोन साहित्यिक दिग्गजांच्या नावाची ध्वजा मराठी मुलखात  उत्तुंग फडकत ठेवलेली आहे.. कविवर्य गो.स.चरणकर यांनी कवितेत आपले अनेक वारस मराठी कवितेला दिले आहेत .. त्यातील एक नाव म्हणजे कवयित्री मनीषा रायजादे. मनीषा रायजादे देशिंग-हरोली येथील श्री महालक्ष्मी विद्यालय येथे शालेय शिक्षण घेत असताना तेथे कविवर्य कै.गो स.चरणकर हे त्यांना शिक्षक होते. चरणकर सर स्वतःच्या घरी संस्कार वर्ग घेत होते.. त्यातून विद्यार्थ्यांची आवड पाहून त्यानुसार त्यांना मार्गदर्शन करीत असत.. त्यांनी कविता लेखनाचे बीज रायजादे यांच्यासह अनेकांत रुजकले, फुलवले, जोपासले.. साहित्यिक प्रा. यशवंत माळी सर यांचेही मार्गदर्शन मनीषा रायजादे यांना मिळत राहीलं.

कवयित्री मनीषा रायजादे या छत्रपती शिवाजी विद्यालय, मिरज येथे शिक्षिका असून त्यां सातत्याने गेली  वीस वर्षे काव्यलेखन करीत आहेत. त्यानी विविध विषयांवर काव्यलेखन केलेलं असून..अनेक काव्यस्पर्धेमध्ये त्यांच्या कवितांना पारितोषके प्राप्त झालेली आहेत.. त्यांचा साहित्यिक मित्र परिवार खूप मोठा आहे.. शब्दांशी आणि साहित्यिकांशी मैत्र जोडणे हा त्यांचा स्वभावच आहे. त्यानी अनेक साहित्य संमेलनामधून, कविसमेलनातून आपली कविता सादर करून उपस्थित साहित्यिक व काव्यरसिकांकडून दाद मिळवली आहे. यवतमाळ येथे संपन्न झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात  निमंत्रित कवयित्री म्हणून त्यां सहभागी होत्या. त्यांच्या कवितांची दखल अखिल भारतीय पातळीवर घेण्यात आलेली दिसून येते.

कवयित्री मनीषा रायजादे यां शब्दांवर कधी आईच्या ममतेने माया करतात, कधी सखी होऊन प्रेम करतात तर कधी त्यांच्यातीक शिक्षिकेच्या काहीशा आग्रही, कडक तरीही मायाळू वृत्तीने वागताना दिसून येतात. त्याची नाळ ही गावातील कृषीपरंपरेशी, निसर्गाशी माणुसकीशी जोडलेली आहे ती त्यांच्या कवितेतून , गझलांतून जपताना दिसतात.. त्यांची कविता त्यांची स्वभावसाक्षी होऊन प्रकट होताना दिसते. त्यांच्या काव्यलेखनात विविध विषयावर त्यांनी काव्यलेखन केलेलं आहे.. त्याची कविता सकारात्मक, आशावादी असून ती अनेकदा संत. ज्ञानेश्वरांच्या पसायदानाशी, जगतगुरु संत तुकोबारायांशी, संत जनाबाई, बहिणाबाई, यांच्याशी आपलं नाते जोडते..

ग्रामीण आणि नागर जीवनातील भवताल , अनुभवविश्व त्यांना लाभलेले आहे ते त्यांच्या कवितेतून प्रकट होताना दिसून येते.. 

निसर्ग आणि मातीशी, कृषिपरंपरेशी त्यांची असणारी नाळ त्यांच्या अनेक कवितांमधून शब्दबद्ध होताना दिसून येते.. कविता बोलू लागली  या कवितेत त्या म्हणतात,

ओल्या गंधित मातीच्या गर्भात

अंकुरल्या बीजांच्या मायेची बहार

अवतीभवती घडणाऱ्या अनेक घटनांमुळे आजचे वर्तमान हे मन व्यथित करणारे, मनात चिंता निर्माण करणारे आहे पण त्याची कविता ही निराशवादी नाही..नित्य आसमानी आणि सुलतानी संकटाशी तोंड देत असतानाही सकारात्मकता आणि आशावाद मनात रुजवून जगणाऱ्या बळीराजाच्या घरात त्याचा जन्म झाल्याने तिच वृत्ती त्यांच्या धमन्यांतून आणि कवितेतून वाहताना दिसून येते ..

रात्र काळोखी जरी ही दाटते आहे

पेटणारे दीप आता आठवावे तू

                       ( आठवावे तू …) 

किंवा

थकली जरी पाऊले ही

वाट जोमाने चालायची

                    ( जीवनाच्या वाटा )

असा सकारात्मक भाव घेऊन त्यांची कविता येते..सकारात्मकता, आशावाद हा त्यांच्या कवितेचा स्थायीभाव आहे.

ग्रामीण कृषी जीवनात अजूनही माणूस माणसाशी जोडला गेलेला आहे.. धर्म, जात, पंथ यातील राजकारणामुळे, जाणीवपूर्वक पसरवल्या जात असलेल्या विद्वेषामुळे माणूस माणसापासून दुरावत चाललाय यामुळे त्या व्यथा होतात.. पण तरीही मानवतेचा ध्वज उत्तुंग फडकवत ठेवण्याची त्यांची मनीषा त्यांच्या कवितेतून ठायी ठायी दिसून येते.

आज जो तो म्हणतोय

माझा धर्म, माझी जात

माणूसच करतोयमाणसाचा की हो घात

                           ( हरवली माणुसकी)

 जन्म मानवाचा । लावावा सार्थकी

धर्म माणुसकी ! जोपासावा ।।

                                       (जनसेवा )

अशा शब्दांत माणुसकी हाच खरा धर्म असल्याचे आणि तो जोपासायला हवा असे प्रतिपादन त्या आपल्या कवितेतून  करतात.

माणसाच्या वृत्ती -प्रवृत्तीवर लिहिताना त्या आपल्या ‘माणसे ‘ या गझल मध्ये म्हणतात,

तोडून सर्व नाती छळतात माणसे

दुसऱ्यावरी सदा ही जळतात माणसे

असे असले तरी निराश न होता त्या मनात आशावाद जोपासताना दिसून येते.. हाच आशावाद माणसाचा स्थायीभाव आहे.. त्याच्या जगण्याचे कारण आहे. हा आशावाद आपल्या गझलरचनेतून व्यक्त करताना , शब्दबद्ध करताना कवयित्री मनीषा रायजादे लिहितात,

आशेवरी सुखाच्या जगतात माणसे

स्वप्नांत मोरपंखी रमतात माणसे

                                   ( माणसे )

वैविध्यपूर्ण आणि सातत्याने कवितालेखन- गझल लेखन करणाऱ्या कवयित्री मनीषा रायजादे पाटील यांचा ‘ काव्यमनीषा ‘ हा पहिला कवितासंग्रह लवकरच प्रकाशित झाला असून त्यांचा गझल संग्रह ही लवकरच वाचकांच्या भेटीला येत आहे.. कवयित्री मनीषा रायजादे-पाटील यांचे त्यासाठी अभिनंदन आणि त्यांच्या पुढील लेखनप्रवासासाठी हार्दिक शुभेच्छाही !

 

प्रस्तुति – श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली

८२७५१७८०९९

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ बालकथा भाषाभगिनींच्या – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ बालकथा भाषाभगिनींच्या – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆ 

पुस्तकाचे नाव  : बालकथा भाषाभगिनींच्या

अनुवादिका     : श्रीमती उज्ज्वला केळकर

प्रकाशक         : श्री सुभाष शंकर विभुते /मासिक ऋग्वेद चिल्ड्रेन रिलीफ फंड, आजरा

पुस्तक परिचय – बालकथा भाषाभगिनींच्या

नुकतंच ‘बालकथा भाषाभगिनींच्या’ या सौ. उज्ज्वला केळकर यांनी अनुवादित केलेल्या कथासंग्रहाचं प्रकाशन झालं. हे पुस्तक मासिक ऋग्वेद चिल्ड्रेन रिलीफ फंड, आजरा या प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे.

वेगवेगळ्या राज्यांतील, वेगवेगळ्या भाषांमधील बालकथा  संकलित करून त्यांचा मराठी अनुवाद उज्ज्वलाताईंनी केला आहे. विविध राज्यांतील पर्यावरण भिन्न असलं, तसंच वेगवेगळ्या आर्थिक स्थरांतील लोकांच्या गरजा भिन्न असल्या तरी या सर्वांच्या मुळाशी असणारी   मूल्यसंस्कृती एकच असते, या विविधतेतील एकतेशी मुलांचा परिचय करून द्यायचं मोलाचं काम हा कथासंग्रह करतो.

यात एकंदर नऊ कथा आहेत. ‘खरी खुशी ‘मधून भूतदयेचे,इतरांच्याही आनंदाचा विचार करण्याचे धडे मिळतील . ‘चांगली अद्दल घडली’मधून पंचतंत्रासारखं व्यावहारिक शहाणपण मिळेल . ‘छोटा मास्तर’ ही कथा आर्थिक भेदभाव नष्ट करून इतरांच्या खऱ्या गरजा ओळखायला शिकवेल. ‘आजीचं गणित’ नीतिमत्तेच्या मौल्यवान धड्यांबरोबर मुलांना तोंडी गणिताचं महत्त्व समजावेल . ‘एलियन्सशी भेट ‘ पर्यावरणाविषयी, एलियन्सविषयी  खूप माहिती देऊन विज्ञानात रस निर्माण करेल .

लोकटक सरोवरातील एका फुमडीवर राहणारी ‘इबेथोई’ जंगल बूकच्या मोगलीशी साधर्म्य साधते. त्यातील तिची प्राण्यांविषयीची, विशेषतः माशांविषयीची आत्मीयता मुलांना खूप काही शिकवून जाईल .

‘बिपाथुचं गोष्टीचं  पुस्तक ‘ तर खूपच सुंदर आहे. त्यातल्या त्या पाढ्यांच्या परीमुळे आजची मुलंही पाढे पाठ करू लागतील.बिपाथुला असणारी आपल्या आर्थिक परिस्थितीची जाणीव, अंध आजीबद्दल वाटणारी सहवेदना, तिची वाचनाची आवड या गोष्टींचा बालवाचकांवर परिणाम होईलच. शिवाय समोर दिसणाऱ्या गोष्टींचं बिपाथुने केलेलं तपशीलवार वर्णन वाचून मुलांनाही पर्यावरणाचं निरीक्षण करण्याची खास नजर मिळेल.

‘कर्जाची परतफेड ‘मधील पैशांऐवजी सेवा या कल्पनेमुळे मुलांच्या मनातील  ‘पैशा’च्या धारणेतही  बदल होईल.

‘एक गोड अशी लाच ‘ ही कथा चुकीची कबुली देणं व त्या टाळण्याचा प्रयत्न करणं, हे नवसापेक्षा श्रेष्ठ आहे, हे मुलांच्या मनावर बिंबवेल.

श्रीमती उज्ज्वला केळकर

भाषिक प्रांतरचनेनंतर भाषिक अस्मिता वाढून राष्ट्रीय एकात्मतेला तडे जाऊ नयेत, म्हणून साने गुरुजींनी ‘आंतरभारती’चं स्वप्न पाहिलं. या कल्पनेतील महत्त्वाचा धागा म्हणजे प्रत्येक प्रांताचं साहित्य. जीवनाची संकुचित दृष्टी नाहीशी होऊन, व्यापक दृष्टीने जीवनाचा अर्थ समजावून घेण्याची क्षमता निर्माण होणे, हे, साने गुरुजींच्या मते शिक्षणाचं उद्दिष्ट असतं. या पुस्तकाने ते उद्दिष्ट नक्कीच साधलं आहे.

पुस्तकाचं मुखपृष्ठ आकर्षक व अर्थपूर्ण आहे. वरच्या भागात मुलांना आवडणाऱ्या प्रतिमांचं कोलाज आहे, तर खाली विविध राज्यातील स्त्रीपुरुषांचं त्यांच्या-त्यांच्या वेषातील चित्र म्हणजेच भाषाभगिनींचं प्रतिकात्मक रूप आहे.

पुस्तकाचा कागद व छपाई उत्तम आहे.

एवढं असूनही,जास्तीत जास्त बालवाचकांपर्यंत हे पुस्तक पोचावं, म्हणून याची किंमत अतिशय कमी, अगदी नाममात्र म्हणजे स्थानिकांसाठी ₹10/- व परगावासाठी ₹15/- ठेवली आहे.

शाळेच्या अभ्यासक्रमात पुरवणी वाचनासाठी हे पुस्तक लावावं. तेवढी या पुस्तकाची नक्कीच योग्यता आहे.

अशाच आणखी कथा उज्ज्वलाताईंनी अनुवादित केल्या आहेत. त्यांचीही पुस्तकं श्री. सुभाष शंकर विभुते /मासिक ऋग्वेद चिल्ड्रेन रिलीफ फंड, आजरा यांनी प्रकाशित करावीत व अशीच अत्यल्प दरात बालवाचकांना उपलब्ध करून द्यावीत, अशी अपेक्षा आहे.

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆‘गावठी गिच्चा’ – श्री सचिन वसंत पाटील ☆ श्री राजेंद्र भोसले

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘गावठी गिच्चा’ – श्री सचिन वसंत पाटील ☆ श्री राजेंद्र भोसले ☆ 

पुस्तकाचे नाव: ‘गावठी गिच्चा’ (कथासंग्रह)

लेखक :             श्री सचिन वसंत पाटील

प्रकाशक:           तेजश्री प्रकाशन, पुणे

प्रकाशन:             प्रथमावृत्ती- 16 नोव्हेंबर 2020

पृष्ठे:                     144

किंमत:                रु 200/—.

ग्राम जिवन चित्रित करणारा कथासंग्रह: गावठी गिच्चा ~ श्री राजेंद्र भोसले.

सचिन वसंत पाटील यांचा ‘सांगावा’ व ‘अवकाळी विळखा’ हे दोन कथासंग्रह यापूर्वी प्रकाशित झाले आहेत.  आता त्यांचा ‘गावठी गिच्चा’ हा तिसरा ग्रामीण कथासंग्रह नुकताच साहित्य दरबारात रुजू झाला आहे.

प्रत्येकाला आपला गाव म्हणजे जिव्हाळ्याचा विषय असतो. सचिन पाटील यांनीही गावगाड्यातील आपले अनुभव कथेत शब्दबद्ध केलेले आहेत. शेतकरी हा घटक केंद्रस्थानी लिहून सचिन पाटील यांनी अनेक समस्यांची डोळसपणे कथेत गुंफण केली.

‘उमाळा’ या कथेत पुष्पाअक्का ही रामभाऊंची सावत्र बहीण. तोंडाने फटकळ, शीघ्रकोपी परंतु मनाने मात्र निर्मळ अशी व्यक्तिरेखा रेखाटली आहे. ती एकदा माहेरी भावाकडे येते त्या वेळी भावालाही हक्काने भांडते. त्या वेळी रामभाऊंचे विहिरीचे काम चालू असते. विहिर प्रमाणापेक्षा जास्त खोदूनही पाणी लागत नाही. अनेकांनी विहिरीला ‘उमाळा’ म्हणजे ‘झरा’ लागणार नाही, असा अंदाज व्यक्त केलेला असतो.  रामभाऊंनीही अपेक्षा सोडलेली असते. बहीण मात्र भावाचे शुभ चिंतते. तिच्या तोंडून सहज शब्द बाहेर पडतात, ‘तुला पाणी लागणारऽ… चांगल्या गोड्या पाण्याचा उमाळा लागणारऽ…’ रामभाऊंना हे खरे वाटत नाही. परंतु विहिरीला पाणी लागल्याचे समजताच आपल्या भोळ्याभाबड्या बहिणीने केलेली भविष्यवाणी आठवून रामभाऊंच्या डोळ्यांत पाणी येते.  विहिरीच्या उमाळ्याबरोबर आपल्या बहिणीच्या मायेचा उमाळाही त्यांच्या मनी दाटून येतो.

‘कोयता’ या कथेत सुलूच्या मनाची घालमेल मांडलेली आहे. आपले शिलरक्षण करण्यासाठी ती हातात कोयता घेते.  ‘डोरलं’ या कथेत सवी या विधवेची अवस्था लेखकाने चपलखपणे मांडली आहे. आपले चारित्र्य शुद्ध ठेवण्यासाठी ती अखेर आपलं डोरलं विकण्याचा निर्धार करते. शीर्षक कथा ‘गावठी गिच्चा’ या कथेत शिवा व त्याची बायको लक्ष्मी यांच्यातील एकमेकांचा घेतला जाणारा सूडही ग्रामजिवनातील विसंगती टिपताना दिसतो. विनोदी अंगाने लिहिलेल्या या कथेत ग्रामीण भागातील बेरकीपणा अधोरेखित झाला आहे. ‘दंगल’ या कथेत जातीय दंगलीतही गावातील विविध धर्माचे लोक माणुसकीचे कसे दर्शन घडवतात हे दाखवले आहे. याशिवाय ‘करणी’, ‘चकवा’, ‘तंटामुक्ती’, ‘टोमॅटो कॅचप’ अशा एकापेक्षा-एक सरस डझनभर कथा या संग्रहात आहेत.

पाटील यांच्या कथेतील काही वाक्ये ग्राममनाचा अस्सलपणा दर्शवतात. जसेकी- ‘अंधार अस्वलाच्या पावलांनी आला’, ‘काळ्याकुट्ट गुंड दगडावर बचकभर आकाराचा बटाटा ठेवावा तसं त्याचं नाक होतं’ ‘एका मापाचं लंब-गोलाकृती कॅप्सुलसारखं उसाचं बारीक-बारीक तुकडे’, ‘ज्ञानूच्या तोंडाला चळाचळा पाणी सुटायला लागलं’, ‘पायरी आंब्याचा आमरस म्हटलं की मेल्याली उठंल’ इ.   

काही इंग्रजी शब्दही ग्रामीण भागात रूढ झाले आहेत. त्या शब्दांचा वापर लेखकाने कुशलतेने केल्यामुळे कथानकाला नैसर्गिकता प्राप्त झाली आहे. उदा.- ‘पॉलिश’, ‘स्टँड’, ड्रायव्हर’, सेकंडहँड’,‘विक पॉइंट’, ‘कॅप्सूल’, ‘पब्लिक’, ‘फर्मान’ इ.

गावगाड्यात येणार्‍या समस्यांबरोबरच लेखकाने विनोदी शैलीत काही समस्यांचे निराकरण केलेले आहे, हे या कथासंग्रहाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. लेखकाची शैली प्रवाही असून अस्सल गावरान भाषा त्यांच्या लेखणीतून पाझरते. त्यांच्या कथा वाचनीय असून आसू व हसू याच सुरेख मिश्रण त्यांच्या कथांत पाहावयास मिळते.              

ज्ञानेश बेलेकर यांनी रेखाटलेले मुखपृष्ठ बोलके व समर्पक आहे. ‘गावठी गिच्चा’ चे रसिक वाचक नक्कीच स्वागत करतील, यात संदेह नाही. सचिन पाटील यांच्या साहित्यप्रवासात या निमित्ताने शुभेच्छा.

© श्री राजेंद्र भोसले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares