मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बालकवी…. – लेखक : श्री श्रीकांत उमरीकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित  ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ? 

☆ बालकवी…. – लेखक : श्री श्रीकांत उमरीकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

त्र्यंबक बापूजी ठोंबरे

५ मे १९१८ ची गोष्ट आहे. अठ्ठावीस वर्षे वयाचा एक तरूण आपल्या धुंदीत चालला होता. जवळची वाट पकडायची म्हणून तो रेल्वेचे रूळ ओलांडून जाणार्‍या छोट्या पायवाटेने निघाला. दोन रूळ एकत्र येवून पुढे जाणार्‍या ठिकाणी तो उभा होता. तेवढ्यात त्याला मालगाडीची शिट्टी ऐकू आली. ही गाडी दुसर्‍या रूळावरून जाईन असा अंदाज होता पण ती नेमकी तो चालला होता त्याच रूळावर आली. घाईघाईत रूळ ओलांडताना त्याची चप्पल तारेत अडकली. ती सोडवण्यासाठी तो खाली झुकला. तोपर्यंत मालगाडी त्याच्या देहाचे तुकडे तुकडे करून निघून गेली.

एरव्ही ही घटना पोलीसांच्या नोंदीत अपघात म्हणून जमा झाली असती.

पण हा तरूण म्हणजे कोणी सामान्य इसम नव्हता.

मराठी कवितेत ‘बालकवी’ म्हणून अजरामर ठरलेल्या “त्र्यंबक बापूजी ठोंबरे” यांची ही गोष्ट आहे.

जळगांव जिल्ह्यातील भादली या रेल्वेस्टेशनवर हा अपघात घडला. किती जणांना आठवण आहे या कवीची?

जागतिक हास्य दिवस मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. या वर्षी हा दिवस ५ मे रोजी संपन्न झाला.

आनंदी आनंद गडे

इकडे तिकडे चोहिकडे

वरती खाली मोद भरे

वायूसंगे मोद फिरे

नभांत भरला

दिशांत फिरला

जगांत उरला

मोद विहरतो चोहिकडे

आनंदी आनंद गडे !

अशी सुंदर आनंदावरची कविता लिहिली त्यांची आठवण हा जागतिक हास्य दिवस साजरा करणार्‍यांना होणार नाही.

आनंदाचे तत्त्वज्ञान अतिशय साध्या सोप्या भाषेत लिहीणारा हा कवी ज्यानं आनंदाची केलेली व्याख्या किती साधी सोपी आणि मार्मिक आहे

स्वार्थाच्या बाजारात

किती पामरे रडतात

त्यांना मोद कसा मिळतो

सोडुनी तो स्वार्था जातो

द्वेष संपला

मत्सर गेला

आता उरला

इकडे तिकडे चोहिकडे

आनंदी आनंद गडे

बालकवींचा जन्म १३ ऑगस्ट १८९० रोजी धरणगाव (जि. जळगांव) इथे झाला. केवळ २८ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या कवीने अतिशय मोजक्या पण नितांत सुंदर आणि नितळ भावना व्यक्त करणार्‍या कविता लिहून मराठी वाचकांवर मोठे गारूड करून ठेवले आहे.

श्रावणमासी हर्ष मानसी 

हिरवळ दाटे चोहीकडे,

क्षणात येती सरसर शिरवे 

क्षणात फिरूनी उन पडे 

किंवा 

हिरवे हिरवे गार गालीचे 

हरित तृणाच्या मखमालीचे 

त्या सुंदर मखमालीवरती 

फुलराणीही खेळत होती

या सारखी गोड रचना असो. आपल्या साध्या सुंदर शब्दकळेने बालकवी वाचकाच्या मनात घर करून राहतात. अशा सुंदर साध्या गोड कविता लिहीणार्‍याला आपण विसरून जातो. त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या आमच्या लक्षातही राहत नाहीत. गावोगावच्या साहित्य संस्था कित्येक उपक्रम सतत करत असतात. तेंव्हा ज्यांची जन्मशताब्दि होवून गेली आहे अशा मराठी कविंवर काहीतरी कार्यक्रम करावे असे का बरे कोणाच्या डोक्यात येत नाही? एक साहित्य संमेलन केवळ शताब्दि साहित्य संमेलन म्हणून नाही का साजरे करता येणार? केशवसुत, बालकवी पासून ते कुसूमाग्रज, मर्ढेकर, अनिल, इंदिरा संत, ना. घ. देशपांडे, बा. भ. बोरकर, वा. रा. कांत, ग. ल. ठोकळ, ग. ह. पाटील अशी कितीतरी नावे आहेत. शंभरी पार केल्यावरही टिकून राहणार्‍यांची आठवण न काढणे हा आपलाच करंटेपणा आहे.

या जून्या कविंची आठवण का काढायची? कोणाला वाटेल कशाला हे सगळे उकरून काढायचे. पण जर जूनी कविता आपण विसरलो तर पुढच्या कवितेची वाटचाल सोपी रहात नाही. बा. भ. बोरकर लिहून जातात

तू नसताना या जागेवर 

चिमणी देखील नच फिरके

कसे अचानक झाले मजला 

जग सगळे परके परके

आणि पन्नास साठ वर्षे उलटल्यावर संदिप खरे सारखा आजचा कवी लिहीतो

नसतेच घरी तू जेंव्हा 

जीव तुटका तुटका होतो

जगण्याचे तुटती धागे 

संसार फाटका होतो

आजचा कवी काळाच्या किती मागे किंवा पुढे आहे हे समजण्यासाठी जूने कवी वाचावे लागतात. त्यांची कविता समजून घ्यावी लागते. जी कविता काळावर टिकली आहे निदान तेवढी तरी कविता आपण वाचणार की नाही? आणि ती नाही वाचली तर मराठी कवितेचेच नुकसान होते.

बालकवींच्याच आयुष्यातील एक काळीज हेलावून टाकणारा प्रसंग आहे.

त्यांच्या शरिराचे तुकडे तुकडे त्यांचे स्नेही आप्पा सोनाळकर पोत्यात भरत होते.

त्यांच्या डोळ्यातून अश्रू खळाखळा वहात होते. बालकवींच्या सदर्‍याकडे हात जाताच आप्पांच्या लक्षात आले की आत घड्याळ आहे आणि ते अजूनही चालूच आहे. बालकवींची एक अप्रकाशित कविता आहे

घड्याळांतला चिमणा काटा

टिक_ टिक् बोलत गोल फिरे

हे धडपडते काळिज उडते

विचित्र चंचल चक्र खरे!

घड्याळातला चिमणा काटा

त्याच घरावर पुन्हा पुन्हा

किति हौसेने उडत चालला

स्वल्प खिन्नता नसे मना!

काळावर इतकी सुंदर कविता लिहीणारा हा कवी आपण कशासाठी जातीपातीच्या चौकटीत, नफा नुकसानीच्या हिशोबात मोजायचा?

शंभर वर्षांपूर्वी होवून गेलेला हा कवि आनंदाचे उत्साहाचे कारंजे आपल्यापुढे कवितेत ठेवून गेला आहे. त्याच्या डोळ्यापुढचे त्याच्या स्वप्नातले जग कसे होते?

सूर्यकिरण सोनेरी हे 

कौमुदि ही हसते आहे

खुलली संध्या प्रेमाने

आनंदे गाते गाणे

मेघ रंगले

चित्त दंगले

गान स्फुरले

इकडे तिकडे चोहिंकडे 

आनंदी आनंद गडे !

बालकवींना १०४ व्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.. !!.. 🙏

┉❀꧁꧂❀┉

लेखक : श्री श्रीकांत उमरीकर

 जनशक्ती वाचक चळवळ, छत्रपती संभाजीनगर,

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ श्री लक्ष्मी नृसिंह सर्वसिद्धिकर ऋणमोचन स्तोत्र॥ – रचना : श्री शंकराचार्य ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

 

☆ ॥ श्री लक्ष्मी नृसिंह सर्वसिद्धिकर ऋणमोचन स्तोत्र॥ – रचना : श्री शंकराचार्य ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

(आज श्री नृसिंह जयंती आहे . — त्यानिमित्ताने सादर.) 

देवकार्य सिध्यर्थं सभस्तंभं समुद् भवम ।

श्री नृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥

*

लक्ष्म्यालिन्गितं वामांगं, भक्ताम्ना वरदायकं ।

श्री नृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥

*
अन्त्रांलादरं शंखं, गदाचक्रयुध धरम् ।

श्री नृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥

*
स्मरणात् सर्व पापघ्नं वरदं मनोवाञ्छितं ।

श्री नृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥

*
सिहंनादेनाहतं, दारिद्र्यं बंद मोचनं ।

श्री नृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥

*
प्रल्हाद वरदं श्रीशं, धनः कोषः परिपुर्तये ।

श्री नृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥

*
क्रूरग्रह पीडा नाशं, कुरुते मंगलं शुभम् ।

श्री नृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥

*
वेदवेदांगं यद्न्येशं, रुद्र ब्रम्हादि वंदितम् ।

श्री नृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥

*
व्याधी दुखं परिहारं, समूल शत्रु निखंदनम् ।

श्री नृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥

*
विद्या विजय दायकं, पुत्र पोत्रादि वर्धनम् ।

श्री नृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥

*
भुक्ति मुक्ति प्रदायकं, सर्व सिद्धिकर नृणां ।

श्री नृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥

*
उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तम् सर्वतोमुखं ।

नृसिंह भीषणं भद्रं मृत्य मृत्युं नमाम्यहम॥

*
य: पठेत् इंदं नित्यं संकट मुक्तये ।

अरुणि विजयी नित्यं, धनं शीघ्रं माप्नुयात् ॥

*

॥ श्री शंकराचार्य विरचित सर्वसिद्धिकर ऋणमोचन स्तोत्र संपूर्णम्॥

*

— मराठी भावानुवाद  —

*

देवकार्यास्तव अर्णवोद्भव सर्व जीवसृष्टी 

श्रीनृसिंह महावीरा नमन करी ऋणमुक्ती ॥१॥

*
लक्ष्मी अलिंगन वामबाजू भक्ता वरदायी

श्रीनृसिंह महावीरा नमन करी ऋणमुक्ती ॥२॥

*
उदरी शंख गदा चक्र आयुधे धारी हस्ती

श्रीनृसिंह महावीरा नमन करी ऋणमुक्ती ॥३॥

*

स्मरणाने पापहारी वरदायी मनोवांच्छिती

श्रीनृसिंह महावीरा नमन करी ऋणमुक्ती ॥४॥

*
करुनीया शार्दूलगर्जना दारिद्र्यातुन मुक्ती

श्रीनृसिंह महावीरा नमन करी ऋणमुक्ती ॥५॥

*

प्रल्हाद वरदा विष्णो करी धन कोष भुक्ती 

श्रीनृसिंह महावीरा नमन करी ऋणमुक्ती ॥६॥

*

सदैव शुभ मंगलकारी क्रूरग्रहपीडामुक्ती

श्रीनृसिंह महावीरा नमन करी ऋणमुक्ती ॥७॥

*

यज्ञेश वेद वेदांगांचा रुद्र ब्रह्मादि पूजिती

श्रीनृसिंह महावीरा नमन करी ऋणमुक्ती ॥८॥

*
व्याधीदुःखहारक समूळ शत्रू निर्दाळिती

श्रीनृसिंह महावीरा नमन करी ऋणमुक्ती ॥९॥

*

विद्या-विजयदायी पुत्रपौत्र वर्धन करिती

श्रीनृसिंह महावीरा नमन करी ऋणमुक्ती ॥१०॥

*
मानवा सर्वसिद्धी देई प्रदान भुक्ती मुक्ती

श्रीनृसिंह महावीरा नमन करी ऋणमुक्ती ॥११॥

*

उग्र वीर महाविष्णु तेजोमय व्याप्ती सर्वत्र 

नमन नृसिंहा मंगल भयाण मृत्यूसी मारत ॥१२॥

*

करिता नित्य पठण स्तोत्राचे होई आपदामुक्ती

पूजन विष्णूचे प्रभाते नित्य शीघ्र होई धनप्राप्ती ॥१३॥

*
॥ श्री शंकराचार्य विरचित निशिकान्त भावानुवादित सर्वसिद्धिकर ऋणमोचन स्तोत्र संपूर्णं ॥

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्लमडाॅग मिलेनिअर – फक्त एक अपवाद की सिद्ध झालेला नियम? ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? इंद्रधनुष्य ?

☆ स्लमडाॅग मिलेनिअर – फक्त एक अपवाद की सिद्ध झालेला नियम? ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

मध्यंतरी माझा एका पालकांशी वाद झाला. त्यांची अशी फार प्रबळ इच्छा होती की, त्यांच्या मुलानं सीए व्हावं. पण त्या मुलाच्या एकूण बुद्धिमत्ता आणि क्षमतांचा अंदाज घेता ते शक्य होईल असं वाटत नव्हतं. मी त्यांना माझं मत सांगितलं. त्यावर ते उसळून म्हणाले, “रिक्षावाल्याची मुलगी सीए होऊ शकते तर हा का होऊ शकत नाही?” एका उच्चशिक्षित पालकांचा दृष्टीकोन असा असू शकतो, हे पाहून मला आश्चर्य वाटलं.

सीए हे केवळ एक उदाहरण आहे. पण अनेक क्षेत्रांच्या बाबतीतही पालकांचे हेच दृष्टीकोन पहायला मिळतात. पुण्यात शिकायला ठेवलं, मोठमोठे महागडे क्लासेस लावले, ट्यूशन्स लावल्या म्हणजे हवं ते यश मिळतंच, अशा गोड भ्रमात पालक आणि मुलं मस्त डुंबत असतात.

मी त्यांना विचारलं, “मग ह्याच न्यायानं एका गरीब सामान्य नावाड्याचा मुलगा जर जागतिक किर्तीचा शास्त्रज्ञ बनू शकतो तर अन्य मुलं का बनू शकत नाहीत?” माझ्या प्रश्नाचा त्यांना राग आला. त्यांच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसतच होतं.

“तुम्ही ‘स्लमडाॅग मिलेनिअर’ हा सिनेमा पाहिलाय का?” मी विचारलं.

“हो. मी पाहिलाय. ” ते म्हणाले.

“झोपडपट्टीत राहणारा, कधीही शाळेत न गेलेला, आणि कंपनीत ऑफिसबाॅयचं काम करणारा मुलगा करोडपती कसा काय बनला?” मी विचारलं.

“कसा काय म्हणजे? समोरच्या व्यक्तीनं त्याला जे प्रश्न विचारले त्यांची उत्तरं त्यानं अगदी अचूक दिली. म्हणूनच तो करोडपती झाला. यात न समजण्यासारखं काय आहे?” ते विजयाच्या सुरात म्हणाले.

“बरोब्बर. आता माझा एक साधा प्रश्न आहे. जर तो अडाणी, गरीब मुलगा १५-२० प्रश्नांची उत्तरं देऊन एक कोटी रूपये मिळवू शकतो, मग तुम्ही तर उच्चशिक्षित आहात. त्याच कार्यक्रमामधून एक कोटी रूपये मिळवणं तुम्हाला अजिबातच अवघड नाहीय. ” मी असं म्हटल्यावर त्यांचा नूरच पालटला. ते खूप अस्वस्थ झाले.

“ह्याच न्यायानं स्पर्धा परिक्षा देणाऱ्या प्रत्येक मुलानं त्यात भाग घेऊन दणादण एकेक कोटी रूपये कमवायला हवे होते ना? दहावी किंवा बारावी पर्यंत शिकलेल्या कुणालाही यात भाग घेऊन ही रक्कम जिंकता आली असती. पण तसं घडलं का?” मी आणखी एक पिल्लू सोडलं. ते गप्प झाले.

स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षा यांचा अभ्यास करणारी मुलं तर दिवसरात्र अभ्यास करत असतात. मग त्यांना ‘कौन बनेगा करोडपती’ सारख्या शोज् मध्ये भाग घेणं आणि भरपूर पैसे कमावणं मुळीच अशक्य नाही. एक मिनिटही अभ्यास न केलेला एक मुलगा एक कोटी रूपये जिंकतो आणि वर्षानुवर्षं दिवसरात्र अभ्यास करणाऱ्या मुलांना स्पर्धा परीक्षा पास होता येत नाहीत, ही काय भानगड आहे? 

“तुम्ही तो सिनेमा पुन्हा बघा. त्या मुलानं कार्यक्रमासाठी कसलाही विशेष अभ्यास केला नव्हता. तयारी केली नव्हती. साधं चहावालं पोरगं होतं ते. रोजचा पेपरसुद्धा वाचत नसेल. तर मग जनरल नाॅलेज च्या पुस्तकांचा तर संबंधच येत नाही. ” मी म्हटलं.

“हो ना. पण अशा परिस्थितीतही तो करोडपती झालाच ना?” ते.

“इथंच तर तुम्ही चुकताय. त्याला जे जे प्रश्न विचारले गेले होते ते सर्व प्रश्न सुशिक्षितांच्या दृष्टीने कठीण होते. पण, तो अशिक्षित मुलगा मात्र त्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकला. कारण, त्यातले प्रश्न त्याच्या रोजच्या जगण्यावागण्याशी निगडीतच होते. त्या प्रत्येक प्रश्नाशी त्याची एकेक आठवण जोडली गेली होती. केवळ तेवढ्याच बळावर तो प्रश्नांची उत्तरं देऊ शकला. कोणताही विशेष अभ्यास न करता! ” मी म्हटलं.

“मी हा विचारच केला नव्हता! ” ते आश्चर्यानं म्हणाले.

“तेच मी म्हणतोय. गरीब अडाणी माणूस केवळ अनुभवांच्या आधारे प्रश्नांची उत्तरं काय देतो आणि चक्क करोडपती काय होतो! यात कष्टांचा किंवा अभ्यासाचा संबंधच कुठं आला? म्हणजे हा एक प्रकारचा जुगारच होता ना?” मी विचारलं.

“हा जुगारच म्हटला पाहिजे. ” त्यांचं उत्तर.

“बिनअभ्यासाचे कुणी एक कोटी रूपये का देईल का?” माझा सरळ प्रश्न.

“खरं आहे. ” ते.

“हेच माझं म्हणणं आहे. आपण नुसत्या दिसण्यावर जाऊ नये. खोलात जाऊन शोध घेतला पाहिजे. खातरजमा केली पाहिजे. आपण यातलं काहीच न करता मोठी जोखीम पत्करतो आणि नंतर पस्तावण्याची वेळ येते. ” 

“मग आता काय करावं?” ते.

“माश्यानं पाण्याबाहेर सुद्धा जिवंत राहिलं पाहिजे, असा आग्रह धरणाऱ्याला लोक मूर्ख म्हणतात. कारण, काल्पनिक भराऱ्या मारून करिअर होत नाही. त्याला वास्तविकतेचा आधार असलाच पाहिजे. तुम्ही मुलांच्या बाबतीत अवास्तव अपेक्षा करणार आणि नको त्या रेसमध्ये त्यांना पळवणार, हे खरोखरच आवश्यक आहे का? प्रत्येक स्लमडाॅग हा मिलेनिअर होऊ शकत नाही आणि प्रत्येक मिलेनिअर हा स्लमडाॅगच असतो असाही नियम नाही. अपवादांनाच सिद्धांत समजण्याची चूक आपण कधीही करू नये. ” मी.

पालक आणि मुलं ‘मला नेमकं काय जमेल?’ याहीपेक्षा ‘मला काय जमू शकेल?’ याचाच विचार अधिक करतात. म्हणूनच, ज्या गोष्टींचा भरवसा नाही आणि ज्यांच्याविषयी धड माहितीही नाही, असेच निर्णय मोठ्या आशेने आणि धाडसाने घेतले जातात. खरं तर अशी विचित्र रिस्क आपण कधीच घेत नाही. पण शिक्षण आणि करिअर निवडीमध्ये मात्र ती घेतली जाण्याचं प्रमाण मोठं आहे. आपण आपल्या सोयीनं नेमके अपवादच शोधतो आणि त्यांनाच सिद्धांत समजण्याची चूक करतो. ही फार मोठी चूक आहे.

आपण आणि आपल्या मुलांनी फॅन्टसीमध्ये जगणं सोडायला हवं. निदान करिअरच्या बाबतीत तरी..!

© श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ W F H…– लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ W F H… – लेखक :  अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

एक विनोदी पण कटू सत्य 

कोरोना जाता जाता आपल्याला Work from home हा एक नवीनच रोग देऊन गेला

…. फार पूर्वी प्रत्येक घरात एक बाळंतीण रूम असायची, just like that आताही बऱ्याच घरी ती रूम असते, तेथे एक आय टी इंजिनिअर दिवाणावर वाकडा तिकडा पडलेला असतो, फक्त बाळाऐवजी लॅपटॉप असतो.

 

कहर म्हणजे बरेचसे जस्ट मॅरीड पोट्टे रात्री दोन पर्यंत लॅपटॉपशी झुंजत असतात, आता त्या घरातील आजीच्या मांडीवर नातू कसा आणि कधी खेळेल?

रिटायर्ड माणूस घरात जड होतो, पण ही बाळंतीण आय टी वाली जड नाही कारण मोठे पॅकेज असते ना आणि घरातील म्हाताऱ्या लोकांना कधीतरी कार मध्ये फिरवतो.

घरात चहा, नाश्ता तयार झाला की अगोदर ह्या आय टी बाळंतिणीला मिळाला पाहिजे, फक्त शेक, शेगडी आणि अळीवाची खीर तेवढी बाकी राहते, डिंक लाडू सुद्धा माऊली तयार ठेवते कारण तिच्या नवऱ्याने एवढे मोठे पॅकेज कधी तिला दिलेले नसते ना

काही असे आय टी वाले तर दिवाळीत नवे कपडे म्हणून ओन्ली बनियन आणि बर्मुडा घेतात म्हणे.

Work from home ही कॉन्सेप्ट आमच्या पुण्यात नवीन न्हाय, लै वर्षापूर्वी विडी कामगारांना विडीची पाने आणि तंबाखू मोजून दिली जायची आणि ते घरून विड्या करून आणायचे.

बऱ्याच ठिकाणी नवरा घरून काम करतो आणि बायको ऑफिसला जाते कार घेऊन, आणि येताना कोथींबिर घेऊन येते.

ही अशी दिवाणवरची दिवाणी मंडळी मग वीकेंड ला जवळच्या एखाद्या वागळीवर जाऊन, वडा पाव खाऊन येतात आणि नायगारा फॉल्स ला गेल्यासारखे बडेजाव करतात

ही आय टी वाली मंडळी लाँग टूर म्हणून कधी कधी सासुरवाडीला निघतात, U S वरून इंडिया ला निघाल्यासारखे आणि मग धुतलेले, इस्त्री केलेले कपडे शोधत बसतात.

कायम स्वरुपी ह्यांना W F H दिले तर पुण्याचे फ्लॅट रेट तरी कमी होतील, एवढेसे खुराडे एक कोटीला म्हणे पुण्यात, कशाला रहायचंय पुण्यात? चितळ्यांची बाकरवडी आणि जोशीचा वडा पाव खायला?

ह्या आय टी वाल्यांना आत्ताच बॅक पेन, मणके, कंबरदुखी, eyesight weak होणे असे प्रॉब्लेम सुरू झालेत, मोठे पॅकेज आणखी पाच दहा वर्षांनी ट्रीटमेंला लागणारच आहे म्हणा

आय टी वाल्याला महिना दोन लाख पगार असतो, पण सोसायटी मध्ये पण कोणी ओळखत नाही आणि सरकारी किंवा खाजगी नोकरी करणाऱ्याला पन्नास हजार पगार पण अर्धी सिटी त्याला ओळखते आणि त्याचे कुठले काम अडत नाही, हा फरक आहे.

पूर्वी इंग्रजांची वेठबिगारी केली आणि आता अमेरिकेची वेठबिगारी,

काय होणार आहे पुढच्या पिढ्यांचे देव जाणे……

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “मरणाला मिठी मारणारा योद्धा-धन्वंतरी!…” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

मरणाला मिठी मारणारा योद्धा-धन्वंतरी! ☆ श्री संभाजी बबन गायके 

मेजर डॉक्टर लैश्राम ज्योतीन सिंग

मरण त्याला काही अगदीच अनोळखी नव्हतं. वैद्यकीय व्यवसायात आणि पुढे सेनेत जबाबदारी सांभाळली तेंव्हा त्याने कित्येक जखमी शरीरं, शत विक्षत देह पाहिले… आणि अर्थात कित्येक मृत्यूसुद्धा! सैन्यसेवा आणि मरण एकमेकांच्या हातात हात गुंफून चालत राहतात… काहींचा हात सुटतो.. काहींचा सुटत नाही! त्यादिवशी मृत्यूदूत त्याला अगदी समोरासमोर भेटले… नव्हे त्यातील एक तर त्याच्याच दिशेने येताना दिसला!

गोष्ट आहे वर्ष २०१० मधील फेब्रुवारी महिन्यातील. त्यादिवशी २६ तारीख होती आणि मेजर डॉक्टर साहेबांना अफगाणिस्तान देशातील राजधानी काबूल मधील भारतीय दुतावासात कर्तव्यावर रुजू होऊन केवळ तेराच दिवस उलटलेले होते. त्यांचा १४ मे १९७२ रोजी सुरु झालेला जीवनप्रवास मणिपूर पासून सुरु होऊन आज ते अफगाणिस्तान मध्ये होते.

जात्याच बुद्धीमान असलेले मेजर साहेब १९९६ मध्ये एम. बी. बी. एस. डॉक्टर झाले. पण अभ्यासासोबत साहेबांना खेळाची आणि त्यातल्या त्यात शरीरसौष्ठव क्रीडाप्रकाराची अतिशय जास्त आवड होती. क्रीडा वैद्यक शास्त्राचा दोन वर्षाचा अभ्यासक्रम त्यांनी मोठ्या हौसेने पूर्ण केला होता.

भारतीय सैन्यात निष्णात वैद्यक अधिकाऱ्यांची नेहमीच गरज असते. पण त्यासाठीची निवड प्रक्रिया अतिशय कठीण मानली जाते. या अधिकारी मंडळींना डॉक्टरकी तर करावी लागतेच, पण गरज पडली तर हाती शस्त्रही धरावे लागते.

१५ फेब्रुवारी २००३ रोजी मेजर साहेब सिल्चर येथील लष्करी रुग्णालयात रुजू झाले. त्यांना वैद्यकीय ज्ञान तर प्रचंड होतेच पण सैन्यात त्यांना सैन्य प्रशिक्षणही प्राप्त झाले.

अतिउंचावर लष्करासाठी रस्ते बांधणी करण्याची जबाबदारी असलेल्या Border Road Organization या GREF अर्थात General Reserve Engineering Force (GREF) मध्ये साहेबांची नेमणूक झाली. भारतीय सैनिकांना ते वैद्यकीय उपचार देत असतच पण परिसरातील इतर नागरीकांनाही त्यांच्या सेवेचा लाभ देत असत.

अरुणाचल प्रदेश हा तर अतिशय दुर्गम प्रदेश. तिथे मेजर साहेबांसारखे निष्णात डॉक्टर उपलब्ध असणे, ही तेथील सामान्य नागरीकांच्या दुष्टीने सुदैवाची बाब होती.

९ फेब्रुवारी २००६ मध्ये डॉक्टरसाहेब आगरतळा येथील लष्करी रुग्णालयात बदलून गेले… आणि हे रुग्णालय त्यांनी अक्षरश: एकहाती चालवले. तेथील जवानांना त्यांनी आपल्या क्रीडावैद्यक शास्त्रातील अभ्यासाचा आणि अनुभवाचा खूप फायदा करून दिला. वेळ मिळेल तेंव्हा फुटबॉल आणि badminton खेळणे हा तर त्यांच्या आवडीचा विषय होता. असा माणूस सर्वांना प्रिय होईल यात नवल नव्हते.

२००७ मध्ये हैदराबाद येथे झालेल्या आंतराष्ट्रीय सैन्य क्रीडा स्पर्धांत साहेबांनी खेळाडूंच्या अंमली पदार्थ सेवन करून खेळणाऱ्या खेळाडूंविरोधात कडक सेवा बजावली. त्यांनी २००८ मध्ये पुण्यात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही वैद्यकीय अधिकारी म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली होती. आगरतळा येथे लष्करी वैद्यकीय रुग्णालयात काम करीत असताना वेळात वेळ काढून त्यांनी इतर खाजगी, शासकीय रुग्णालयांतही विनामूल्य सल्लासेवा उपलब्ध करून दिली होती.. हे विशेष.

२००७ मध्येच त्यांना सैन्य सेवा मेडल आणि अतिउंचीवर उत्तम सेवा केल्याबद्द्लचे पदक प्रदान केले गेले. सैनिक निवडीसाठी असलेल्या वैद्यकीय पथकातही त्यांनी अतिशय उत्तम सेवा केली.

२०१३ वर्ष सुरु झाले होते. त्यावेळी भारताचे अफगाणिस्तान मधील काबूल मध्ये वैद्यकीय कार्य सुरु होते. साहेबांचा अनुभव आणि कष्ट करण्याची वृत्ती पाहून त्यांना काबूल मध्ये Indian Medical Mission मध्ये सहभागी करून घेण्यात आले… हा एक मोठा बहुमान समजाला जातो!

युद्धग्रस्त, हिंसाचारग्रस्त अफगाणिस्तानमधील अनेक नागरिक भारताने मानवतेच्या भूमिकेतून उभारलेल्या या वैद्यकीय सेवा कार्याचा लाभ घेण्यासाठी मोठी गर्दी करीत होते. तिथल्या नूर गेस्ट हाऊस मध्ये भारतीय डॉक्टर्स मंडळींची राहण्याची व्यवस्था केली गेली होती. अर्थात या गेस्ट हाऊसला भारतीय सैन्याने सशस्त्र संरक्षण पुरवले होतेच. कारण अफगाणिस्तान मधील परस्पर विरोधी गट कधीही हल्ला चढवू शकत होते. खरे तर मानवतेच्या दृष्टीकोनातून चाललेले हे सेवाकार्य होते.. पण अतिरेकी मनाला ह्या बाबी समजू शकत नाहीत… हेच खरे!

त्यादिवशी या गेस्ट हाऊस मध्ये सहा लष्करी वैद्यकीय अधिकारी, ५ सह-वैद्यकीय कर्मचारी आणि इतर काही अधिकारी वास्तव्यास होते. आणि या इमारतीवर अतिरेकी हल्ला चढवण्यात आलाच… भयावह हल्ला. पाचशे किलो आर. डी. एक्स. ने भरलेले एक वाहन या इमारतीच्या अगदी समोर आले. त्यातून तीन हल्लेखोर उतरले आणि इमारतीकडे धावले.. याच इमारतीच्या पलीकडील इमारतीत अन्य काही परदेशी लोक वास्तव्यास होते… आधी भारतीय पथकाला मारले की ते अतिरेकी तिथून पुढील इमारतीत जाणार होते…

तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी विरोध करताच त्या वाहनचालकाने ते वाहन स्वत:सह इमारतीच्या सीमा भिंतीवर धडकवले. हा धमाका इतका मोठा होता की तिथे साडे तीन मीटर बाय अडीच मीटर खोलीचा खड्डा पडला! वाहनातून आधीच उतरून पळत आलेल्या चालून आलेल्या तिघा अतिरेक्यांनी मग या इमारतीवर हातगोळे फेकले… आणि ती इमारत पेटली!

कामावर निघायच्या तयारीत असलेल्या डॉक्टर्स लोकांकडे एकच हत्यार होते… स्टेथोस्कोप.. आणि हे हत्यार जीव वाचवणारे होते… पण स्वत: डॉक्टर मंडळीचा जीव वाचवण्याच्या क्षमतेचे नव्हते.

सर्वजण त्यातल्या त्यात सुरक्षित असणाऱ्या खोल्यांकडे पळाले…. पण त्यांना अतिरेक्यांनी पाहिले… क्षणार्धात एके ४७ रायफली धडाडल्या… हातगोळे फेकले जाऊ लागले… आश्रय घेतलेल्या खोल्यांमध्ये आता मृत्यूचे तांडव सुरु झाले… काही माणसं मारली गेली!

मेजर लैश्राम मात्र त्या आगीने वेढलेल्या खोलीतून थेट बाहेर पडले… एक अतिरेकी त्याच खोलीच्या दिशेने धावत येत होता… त्याच्या हातात शस्त्रे होतीच… हातगोळे सुद्धा होते. मेजर लैश्राम सुद्धा त्याच्या दिशेने विद्युतवेगाने धावत सुटले… मेजर स्वत: खूप जखमी होते.. रक्तबंबाळ झालेले होते…

अतिरेक्याने हातगोळा फेकण्याआधीच लैश्राम साहेबांनी त्याला मिठी मारली… त्याचे दोन्ही हात जखडून टाकले…. तारुण्यात शरीरसौष्ठ्व सरावाने कमावलेले स्नायू आता खरोखरीचे बळ दाखवू लागले… तो अतिरेकी खूप धिप्पाड, बलदंड होता.. पण मेजर साहेबांची हिंमत त्याच्यापेक्षा भारी होती… पण त्या हल्लेखोराकडे आणखी एक जालीम शस्त्र होते…. शरीराला गुंडाळून घेतलेली स्फोटके! तो सुसाईड मिशनवर होता…. त्याच्यासोबत तो अनेक जीवांना घेऊन परलोकी जाण्यास सज्ज होता….!

मेजरसाहेबांनी त्याला असा दाबून धरला की त्याला श्वास घेणे दुर्धर झाले… रायफल चालवणे तर दूरच… त्याच्या हातातल्या हातगोळ्यांचा त्याला वापर करणेही शक्यच नव्हते… यात बराच वेळ गेला… त्यामुळे इतरांना तिथून सुरक्षित निसटून जाण्याचा अवधी मिळाला.

शेवटी त्याने करायचे ते केलेच.. त्यापासून मात्र साहेब त्याला दुर्दैवाने रोखू शकले नाहीत… त्याने कमरेला लावलेल्या स्फोटकांचा स्फोट घडवून आणला… क्षणार्धात दोघांच्याही देहांच्या चिथड्या उडाल्या… रक्ता-मांसाचा चिखल नुसता! पण यात साहेबांचे रुधीर त्यागाच्या, देशभक्तीच्या सुगंधाचे वाहक होते! आपल्या इतर दहा सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी या डॉक्टर साहेबांनी आपले प्राण अर्पण केले होते…

औषध उपचारांनी प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांनी आपले रक्त शिंपडून इतरांचे प्राण राखले! ही कामगिरी केवळ अजोड… नि:स्वार्थी आणि मोठ्या शौर्याची. संकट आले म्हणून माघारी न पळता संकटाला आपल्या पोलादी बाहुपाशात घेणाऱ्या भारतीय सैनिकाचे रक्त होते ते….

शांतता काळातील सर्वोच्च सैन्यपदक ‘अशोक चक्र’ डॉक्टर साहेबांना मरणोत्तर प्रदान करण्यात आले. त्यांच्या बंधूंनी हे पदक तत्कालीन राष्ट्रापती महोदया महामहीम श्रीमती प्रतिभाताई देवीसिंग पाटील यांच्या हस्ते मोठ्या अभिमानाने आणि भावाच्या आठवणींनी भरलेल्या काळजाने स्वीकारले.

मणिपूर मधील नाम्बोल गावात हुतात्मा मेजर डॉक्टर लैश्राम ज्योतीन सिंग साहेब यांच्या मागे त्यांचे पिताश्री आणि मातोश्री त्यांच्या आठवणीत दिवस काढत आहेत. आईबाबा लहानग्या ज्योतीन साहेबांना लाडाने इबुन्गो म्हणून हाक मारत.

विविध प्रकारे त्यांच्या स्मृती जतन करण्याचा प्रयत्न झाले आहेत. पण भारतातील खूप लोकांना हे नाव अद्याप बहुदा माहीत नसावे… असे वाटले… म्हणून हा लेखन-प्रयास!

जय हिंद! जय हिंद की सेना!

(ही माहिती लिहिताना मेजर जनरल ए. सी. आनंद साहेब, (विशिष्ट सेवा मेडल विजेते) यांच्या लेखाचा आणि इंटरनेटवरील इतर साहित्याचा आधार घेतला आहे.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख ३  ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख ३  ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

अमृतस्वरूपा च ॥ ३ ॥

अर्थ : आणि (ती भक्ति) अमृतस्वरूपा (ही) आहे.

विवरण : द्वितीय सूत्रात परमप्रेम हे भक्तीचे यथार्थ स्वरूप आहे, असे स्पष्ट केल्यानंतर या सूत्रात त्या प्रेम भक्तीचा एक महत्त्वाचा विशेष श्री नारदमहर्षि सांगतात, ती प्रेमरूपा भक्ती ‘अमृतस्वरूपा’ आहे. अमृत म्हणजे मरण-विनाश-बाधरहित अवस्था अथवा स्वरूप होय.

विवेचन:

सर्व संतांनी सत्संगाचा महिमा गायिला आहे. भक्ति करणे म्हणजे भगवंताशी संग करणे, असे म्हटले तर अधिक उचित होईल. एखाद्या मनुष्याचा हात चुकून कोळशाला लागला तरी त्याचा हात काळा झालाच म्हणून समजा. याच सूत्रानुसार भगवतांच्या थोड्याशा सत्संगाचा मनुष्याच्या जीवनावर प्रभाव पडत असतो. 

अमृत शब्दाचा प्रचलित अर्थ असा आहे की जे मृत्यू पासून आपल्याला वाचवते ते अमृत. समुद्र मंथनातून अमृत निर्माण झाले असे म्हणतात…..

थोडक्यात जे आपल्याला अमर करते ते अमृत. आजपर्यंत अनेक लोक जन्माला आले आणि मृत्यू पावले. त्यांची गणती करणे निव्वळ अशक्य आहे. त्यातील काही मोजक्या लोकांची नावे आपल्या लक्षात आहेत, इतिहासाला ठाऊक आहेत. ज्यांनी या धरती साठी, समाजासाठी, योगदान दिले, त्याग केला, विशेष कार्य केलं त्यांचीच नावे समाजाने लक्षात ठेवली आहेत. त्यातील प्रमुख नावे ही संतांची आहेत. आपल्याला आपल्या मागील चौथ्या किंवा दहाव्या वंशजाचे नाव सांगता येईलच असे नाही पण माउलींचे, समर्थांचे, तुकारामांचे, अर्थाचे संतांचे गोत्र ही पाठ असेल,. ही किमया नव्हे काय ? ही किमया कशामुळे  घडली असेल….?

प्रत्येक संतांनी आपल्या आवडीनुसार भक्ति केली असेल, नवविधा भक्तीचा अंगिकार केला असेल, पण भक्ति च केली यात बिल्कुल शंका नाही. भक्ति करणारा मनुष्य देहाने जातो, पण नामरूपाने, कीर्तिरूपाने अमर होतो, अमर राहतो हे सिद्ध होते. 

मेलेल्या मनुष्याला अमृत देऊन काही काळापुरते जिवंत करणे आणि भक्ताला मरण प्राप्त झाल्यानंतरही अनंत काळ अमर करणे , यात अमृत श्रेष्ठ म्हणता येईल की भक्ति….? आपल्या मनात भक्ति हेच उत्तर आले असेल ना ?

अमृत स्वरूपा असे नारद महाराज म्हणतात, तेव्हा त्याचा अर्थ कसा घ्यायचा ? सरळ अर्थ घेतला तर आपल्या लक्षात येईल की भक्ति मुळे मनुष्य अमृत समान होऊ शकतो…!

स्वरूप म्हणजे आपले रूप असा अर्थ घेतला तर आपले रूप आरशात दिसते तसे आहे की कसे ? आरशात दिसते ते बाह्य रूप आहे आणि दिसत नाही, जे अंतर्यांमी आहे ते आत्मरूप आहे. भगवंताला जाणणे म्हणजे अंतर्यामी असलेल्या आत्म तत्वाला जाणणं….

शबरी मातेची कथा आपल्याला माहित आहे. काही शे  बोकडांची हत्या होऊ नये, म्हणून ही मुलगी लग्नाच्या आदल्या दिवशी घर सोडून निघाली ती मातंग ऋषींच्या आश्रमात आली. मातंग ऋषींनी तिला सांगितले की तू अखंड नाम घे, प्रभू श्रीराम तुझे दर्शन घ्यायला येतील….! तिचा तिच्या सद्गुरूंवर पूर्ण विश्वास होता. गुरू वाक्य प्रमाण मानून तिने साधना करायला सुरुवात केली. तिला राम कसे असतील हे माहीत असण्याचे कारण नव्हतं. तिने आपल्या मनात रामाची प्रतिमा तयार केली. अर्थात ते आपल्या मातंग ऋषींसारखेव असतील……! जटाभार ठेवलेले, वल्कले नसलेलं…! शबरी जसे रूप मनात धरले, अगदी त्याच रुपात येऊन रामाने तिला दर्शन दिले.  एवढेच नव्हे तिची उष्टी बोरे भगवंताने आनंदाने खाल्ली. लक्ष्मण तिला म्हणाला की ही बोरे उष्टी आहेत. त्यावर ती म्हणाली की ही बोरे दिसायला उष्टी आहेत, पण खऱ्या आज ती अभिमंत्रित आहेत. हे सामर्थ्य भक्तीने प्राप्त होऊ शकते….!

जय जय रघुवीर समर्थ!!!

देवर्षी नारद महाराज की जय!!!

– क्रमशः सूत्र ३ 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “ही देशाची खरी कन्यारत्ने …” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

“ही देशाची खरी कन्यारत्ने … ☆ श्री संभाजी बबन गायके 

होय, याच त्या कर्नल सोफिया कुरेशी मॅडम.  तुम्ही आज भारताने  पाकिस्तानी अतिरेकी प्रशिक्षण केंद्रांवर चढवलेल्या हवाई हल्ल्याचे media briefing करताना पाहिलेल्या सैन्याधिकारी ! आणि त्यामध्ये सहभागी झालेल्या विंग कमांडर व्योमिका सिंग !! 

– – एक ASEAN मध्ये गवसलेलं रत्न ! आणि एक आकाशाने भारताला दिलेलं कन्यारत्न !

या दोघींनी आज जे केलं.. तो खरा इतिहास असणार आहे ! 

The Association of South East Asian Nations अर्थात ASEAN संघटनेचे नाव भारतासाठी नवीन नाही. आशियातील दक्षिणपूर्व देशांनी एकत्रित येऊन ही संघटना स्थापन केली आहे. अर्थातच आपल्या भारत देशाचा या चळवळीत मोठा वाटा आहे. 

— — थायलंड,व्हिएतनाम,म्यानमार, सिंगापूर, फिलिपिन्स,मलेशिया,ब्रुनेई,लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक,इंडोनेशिया,कंबोडिया इत्यादी बहुदा १८ देश आसीयान मध्ये सामील आहेत. जगात इतर जागतिक महासत्ता असताना आणि त्या त्यांचे प्रश्न सोडवण्यात गुंतलेल्या असताना, त्यांच्या तुलनेने लहान असणाऱ्या देशांच्या स्वतःच्या काही समस्या असतात,त्या सोडवण्यासाठी या लहान देशांनी एकत्रित येणे गरजेचे होते. 

या सर्व अठरा देशांच्या पायदळ सैन्याचा एक मोठा प्रशिक्षण आणि संयुक्त सराव २०१६ मध्ये पुण्यात पार पडला. यापैकी १७ देशांच्या सैन्याचे नेतृत्व पुरुष करीत होते…मात्र भारतीय सैन्यतुकडीचे नेतृत्व होते सोफिया कुरेशी या कणखर तरुणीकडे! भारतीय सैन्याच्या दळणवळण विभागात Corps of Signals मध्ये या एक अतिशय आदरणीय अधिकारी म्हणून गणल्या जातात. दळणवळण संदर्भातील कामांत त्या वाकबगार असून अतिरेकी विरोधी कारवायांत आघाडीवर असतात.

 Asean सारख्या मोठ्या सैन्य संमेलनात भारतीय सैन्याचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी म्हणून त्यांचे नाव इतिहासात नोंदले गेले आहे ! त्यावेळी मेजर जनरल पदावर असलेले व पुढे Chief of Defence Staff या सर्वोच्च पदावर पोहोचलेले दिवंगत बिपीन रावत साहेब यांनी सोफिया यांच्याबद्दल बोलताना..’ त्या अंगभूत नेतृत्वगुण आणि कौशल्याच्या जोरावरच या सन्मानास पात्र ठरल्या आहेत..’ असे गौरवोद्गार काढले, हे लक्षणीय आणि सोफिया यांचे कर्तृत्व अधोरेखित करणारे आहे!

गुजरात मध्ये वडोदरा येथे १९८१ या वर्षी जन्मलेल्या सोफिया या microbioligy विषयात पदवीधर आहेत. त्यांचे आजोबा भारतीय सैन्यात धार्मिक शिक्षक पदावर कार्यरत होते..त्यामुळे त्यांच्यावर भारतीय सैन्याचे संस्कार लहानपणापासूनच होत गेले. त्यांनी १९९९ मध्ये OTA Chennai येथून भारतीय सेनेत प्रवेश मिळवला. २००१ मध्ये ऑपरेशन पराक्रम मध्ये त्या पंजाब येथे कर्तव्यावर होत्या. त्यांचे यजमानही mechanized infantry मध्ये कार्यरत आहेत!

सोफिया यांनी UN Peace Keeping Force मध्ये आणि पुढे Congo या युद्धग्रस्त देशात अनेक वर्षे सेवा बजावली असून त्यांना military negotiations आणि सेवाकार्याचा प्रदीर्घ अनुभव आहे.

आजच्या briefing मध्ये सहभागी झालेल्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्या व्योमिका नावाचा अर्थच मुळी आकाश कन्या असा आहे..त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन जीवनापासूनच हवाई दलात कारकिर्द घडवण्याचा चंग मनाशी बांधला होता. आणि हा हट्ट खराही करून दाखवला. भारतीय हवाई दलात एक अत्यंत धैर्यवान,कुशल हेलिकॉप्टर पायलट म्हणून त्यांचे नाव सन्मानपूर्वक घेतले जाते! चिता आणि चेतक नावांची अत्याधुनिक  हेलिकॉप्टर्स त्या लीलया उडवतात…अडीच हजार तासांपेक्षा जास्त उड्डाणे त्यांनी यशस्वी केली असून काही वर्षांपूर्वी अरुणाचल प्रदेशात आलेल्या नैसर्गिक आपत्तींमध्ये त्यांनी अत्यंत खराब हवामानात एकही अपघात होऊ न देता संकटग्रस्त लोकांची सुटका करण्यात यश मिळवले होते. व्योमिका सिंग यांनी २१,६५० फूट उंचीवर असणाऱ्या माउंट मणिरंग शिखरावर यशस्वी चढाई सुद्धा करून दाखवली आहे! २००४ मध्ये हवाई दलात प्रवेश मिळवलेल्या व्योमिका मॅडम २०१७ मध्ये विंग कमांडर बनल्या!

या दोघींनी  ही  briefing ची जबाबदारी उत्तमपणे पार पाडली .. आणि त्यांच्या द्वारे भारतीय सैन्य आणि राजकीय नेतृत्व यांनी पाकिस्तानला आरसा दाखवला आहे….सुवासिनी महिलांचे सौभाग्य कुंकू पुसणाऱ्या नेभळट देशाला या आरशात काही दिसेल, ही अपेक्षा !

India is proud of you both…

Col. Sofiya madam and Wing Commander Vyomika Singh madam …Jai Hind!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अशी विचित्र नावे का?  ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? इंद्रधनुष्य ?

☆ अशी विचित्र नावे का? ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

पुण्यात अनेक मारुती मंदिरे आहेत. पण त्यात विचित्र नावाची काही मंदिरे आहेत. त्यासंबंधी काही माहिती.

1) पत्र्या मारुती

पुण्यात ससून रुग्णालयाचे काम चालू होते. त्यासाठी पत्रे मागवले होते. रुग्णालय बांधताना त्या पत्र्यांचा उपयोग केला गेला. त्यात काही तुकडेही होते. त्या सर्व तुकड्यांचा उपयोग करून नारायण पेठेत एक मंदिर बांधले गेले. त्यात मारुतीची प्रतिष्ठापना केली. लोक साहजिकच त्या मंदिराला पत्र्या मारुती मंदिर असे म्हणू लागले. पुण्यात लक्ष्मी रोड आहे. तिथे शगुन चौक आहे. त्या चौकातून रमणबाग शाळेकडे जाताना एक चौक लागतो. त्या चौकात हा पत्र्या मारुती आहे.

2) जिलब्या मारुती 

जिलब्या मारुती मंदिर पुण्यातील तुळशीबागे जवळ आहे. खूप वर्षांपूर्वी तिथे एक हलवायाचं दुकान होतं. तो हलवाई रोज खूप जिलब्या बनवायचा. पण प्रथम तयार झालेल्या जिलब्यांचा एक हार बनवायचा आणि श्रद्धेनं त्या मारुतीच्या गळ्यात घालायचा. ते पाहून लोकांनीच त्याला जिलब्या मारुती असे नाव ठेवले.

3) दुध्या मारुती 

हे मंदिर शुक्रवार पेठेत आहे. मंदिराच्या परिसरात पूर्वी गाई-म्हशींचा गोठा होता. तिथे खूप दूध तूप मिळत असे. येथील गोठ्यातील गवळी या मारुतीवर दुधाचा अभिषेक करायचा. इतर ठिकाणी सर्व देव पाण्याच्या अभिषेकाने थंड होत असतात. येथे मात्र दुधाचा अभिषेक. म्हणून या मारुतीला दुध्या मारूती असे नाव पडले

4) बटाट्या मारुती 

हे मंदिर पुण्यातील शनिवार वाड्यातील मैदानावर आहे. पूर्वी इथेच भाजी मंडई भरत असे. आजूबाजूचे शेतकरी या ठिकाणी भाजीपाला विक्री करत असत. तिथे कांदा बटाटा खूप प्रमाणात विकला जात असे. बटाटा विकणारे शेतकरी या मंदिराच्या शेजारीच बसत असत म्हणून त्याला बटाट्या मारुती असे नाव पडले

5) उंबऱ्या मारुती 

.. हे मंदिर बुधवार पेठेत आहे. हे मंदिर उंबराच्या झाडाखाली आहे म्हणून याला उंबऱ्या मारुती असे नाव पडले.

6) खरकट्या मारुती 

लक्ष्मी रोडवरील तुळशी बागेत हे मंदिर आहे. पूर्वी दर्शनासाठी आजूबाजूचे खूप लोक येत. त्यावेळेस हॉटेल्स नव्हती. ते घरूनच जेवण बांधून आणत असत. ते बांधून आणलेली शिदोरी मंदिराच्या परिसरात बसूनच खात असत. तिथे त्यांचे खरकटे पडत असे म्हणून त्याला खरकट्या मारुती असे नाव पडले.

7) रड्या मारुती 

हे मंदिर गुरुवार पेठेत आहे. पूर्वी लोक या मारुती समोर मृतदेह ठेवून रडत असत. म्हणून ला रड्या मारुती असे नाव पडले.

8) उंटाड्या मारुती 

पुण्यात रास्ता पेठेत केईएम हॉस्पिटल प्रसिद्ध आहे. पूर्वी पेशव्यांचा उंटांचा काफीला त्या हॉस्पिटल समोर थांबायचा. तिथे नियमित उंटांचा तळ असायचा म्हणून त्याला उंटाड्या मारुती असे नाव पडले

9) डुल्या मारुती 

पुण्यात हे मंदिर गणेश पेठेतील लक्ष्मी रोडवर आहे. हे मंदिर खूप पूर्वी स्वामी समर्थांनी बांधले आहे असे म्हणतात. पानिपतच्या युद्धात आपले मावळे अहमद शहा अब्दालीशी लढत होते. ते युद्ध अत्यंत गंभीर होतं. युद्धाचे हादरे या मारुतीला देखील बसू लागले. तो अक्षरशः डुलू लागला. म्हणून त्याला डुल्या मारुती असे म्हणू लागले.

10) भांग्या मारुती 

पुण्यात शिवाजी रोडवर रामेश्वर चौक आहे. त्या चौकात हे मंदिर आहे. शनिवार वाड्यापासून श्रीमंत दगडूशेठ गणपती कडे जाताना उजव्या बाजूला हे मंदिर आहे. पूर्वी या मंदिराच्या परिसरात गांजा विकत असत. भांगदेखील विकली जात असे. म्हणून या मंदिराला भांग्या मारुती असे नाव पडले.

– – वर्षानुवर्षे या मंदिरांची अशीच नावे आहेत. ती नावे बदलण्याचा देखील काही लोकांनी प्रयत्न केला. धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून देखील मंदिरांची ही विचित्र नावे बदलण्याचा प्रयत्न झाला. मात्र पुणेकरांच्या विरोधामुळे ते शक्य झाले नाही. ही नावे पुण्याच्या समृद्ध ऐतिहासिक अस्मितेचा आणि धार्मिक वारशाचा भाग आहेत असे लोकांचे ठाम मत आहे. त्यामुळे अजून तरी हीच नावे या मंदिरांना दिली गेली आहेत.

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “दुश्मनी में भी इक शराफत रखते हैं…” भाग – २ ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

? इंद्रधनुष्य ?

☆ “दुश्मनी में भी इक शराफत रखते हैं…” भाग – २ ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

(कॅम्पमध्ये पोचल्यानंतर आमच्यापैकी काहीजण रेडक्रॉसतर्फे मिळालेली पुस्तके वाचण्यात दंग झाले, तर काहीजणांनी धार्मिक वाचन व प्रार्थनेला वाहून घेतले. काही थोडेजण मात्र अगदीच सैरभैर झाले आणि अखेरपर्यंत निराशेच्या गर्तेतच राहिले.) – इथून पुढे —– 

डुंगरसिंग नावाचा एक सुभेदार आमच्या कॅम्पचा प्रमुख जेसीओ (ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर) होता. कॅम्पचे व्यवस्थापन आणि आमच्यामध्ये असलेला तो एकमात्र दुवा होता. सडसडीत बांध्याचा, मध्यम उंचीचा, काळा-सावळा डुंगरसिंग तसा दिसायला सामान्यच होता. मात्र त्याचे अंतरंग हळूहळू उलगडत गेले. तो एक अतिशय कर्तव्यनिष्ठ, सरळसाधा, मनमिळाऊ आणि संवेदनशील माणूस वाटे. प्राप्त परिस्थितीत त्याने आणलेले ते सोंग असू शकेल असे कुणालाही वाटणे साहजिक होते, पण कालांतराने घडलेल्या काही गंभीर प्रसंगातून मला त्याचा खरा स्वभाव कळत गेला.

भारतीय सैन्यातल्या एका इन्फन्ट्री बटालियनमध्ये शिपाई म्हणून भरती होऊन सुभेदार पदापर्यंत पोचलेला डुंगरसिंग रोहतक-हिसार भागातला राहणारा होता. आमच्याकडच्या पंजाबी लोकांप्रमाणेच भारतातले रोहतकी लोकदेखील बोलण्या-वागण्यामुळे काहीसे आडदांड वाटले तरी वृत्तीने साधेसरळ असतात. त्यांची रोखठोक पण काहीशी शिवराळ अशी उर्दूमिश्रित पंजाबी भाषा आणि नर्मविनोदी बोलणेही सहजच मनाला भिडणारे असते.

आम्हाला लागणाऱ्या, साबण, टूथपेस्ट व ब्रश, दाढीचे सामान, अशा दैनंदिन वापराच्या वस्तूंची एक यादी करून महिन्याच्या सुरुवातीला डुंगरसिंगकडे सुपूर्द करणे हे माझे काम होते. दरमहा भत्त्यापोटी मिळणाऱ्या दरडोई ९० रुपयांमधून ही खरेदी केली जाई. या व अशा प्रकारच्या संभाषणातून माझा व डुंगरसिंगचा परिचय वाढत गेला आणि आमच्यादरम्यान एक वेगळेच नाते निर्माण झाले. त्या विलक्षण माणसासोबतच्या नात्याचे स्मरण ठेवूनच आज चाळीसहून अधिक वर्षानंतर माझे हे मनोगत मी लिहितो आहे.

पैसे, घड्याळे, अंगठ्या वगैरे मौल्यवान वस्तू बाळगायला बंदी असल्याने त्या आमच्याकडून आधीच काढून घेतल्या गेल्या होत्या. माझी साखरपुड्याची अंगठी मी मोठ्या हिकमतीने लपवून ठेवलेली होती. एके दिवशी मी ती अंगठी कुरवाळत बसलेलो असताना अचानकच डुंगरसिंगने मला पाहिले. ती अंगठी माझ्या वाग्दत्त वधूने मला दिली असल्याने ती जमा केली नसल्याचे मी त्याला सांगितले. डुंगरसिंगच्या पुढच्या वाक्यामुळे, त्याची संवेदनशीलता आणि त्याच्या मनाच्या मोठेपणाबाबत माझी खात्री झाली, “साहेब, देव तुमचे भले करो. ती मुलगी खरोखरच मोठी भाग्यवान आहे. “

काही दिवसातच, आमच्या खोलीतून आम्ही एक भुयार खणायला सुरुवात केली होती. रोज रात्री थोडे-थोडे काम आम्ही करत होतो. आमच्यापैकी एकजण खिडकीशी बसून टेहळणी करत असे. कॅम्पचे एकमेव प्रवेशद्वार तिथून दिसू शकत होते. प्रवेशद्वारापासून आमच्या खोलीपर्यंत पोचायला सहजच पाचेक मिनिटे लागत असत. माझी खणायची पाळी संपवून मी विश्रांती घ्यायला पाठ टेकणारच होतो तेवढ्यात खोलीच्या दरवाज्यावर जोरजोराने थापा पडू लागल्या. आमच्या ‘टेहळणी बुरुजा’ला बहुदा मध्येच डुलकी लागली होती. आमची एकच तारांबळ उडाली. कॅम्प व्यवस्थापनाला पक्की खबर मिळाली असणार. म्हणूनच भारतीय शिपाई तडक आमच्या खोलीपर्यंत येऊन पोचले होते. आमच्या बराकीची बित्तंबातमी डुंगरसिंगशिवाय कुणाकडे असणार होती?

आम्ही घाईघाईने सर्व झाकपाक केली आणि दरवाजा उघडण्यापूर्वी झोपेच्या नाटकाचे संपूर्ण नेपथ्य तयार केले. आम्हाला बराकीतून बाहेर काढून उभे केले गेले. खोलीची झाडाझडती सुरु झाली. बाहेर पडण्यापूर्वी, माझी अंगठी मी शिताफीने माझ्या सामानातून काढून माझ्याजवळ ठेवली होती. पण लगेच आमची अंगझडतीही सुरु झाली. अंधारातच माझ्या खांद्यावर कुणीतरी हलकेच थापटल्यासारखे केले आणि एक हात माझ्यापुढे पसरला गेला. तो डुंगरसिंगचा हात होता. मी काय करणे अपेक्षित होते हे मला कळून चुकले. मुकाट्याने त्याच्या हातावर माझी अंगठी मी ठेवली. झडतीची कारवाई संपली आणि डुंगरसिंगासह सगळी पार्टी निघून गेली. आमचा पलायनाचा बेत तर फसलाच होता, पण त्या रात्री मला झोप लागणे तसेही अशक्यच होते. त्या अंगठीतल्या सोन्याचे वजन आणि त्याच्या किंमतीची मला पर्वा नव्हती. पण ज्या प्रतिकूल परिस्थितीत मी होतो त्या काळातला माझा एकमेव भावनिक आधार मी गमावला होता!

दुसऱ्या दिवशी मंद हसत आणि डोळे मिचकावत सुभेदार डुंगरसिंग माझ्यापाशी येऊन म्हणाला, “तुम्ही लोक काहीनाकाही ‘चमत्कार’ दाखवण्याच्या तयारीत असणार याची कल्पना मला होतीच. इतर बराकीतल्या लोकांपेक्षा अधिक लाल दिसणारे तुमचे डोळेच सर्व काही सांगत होते! ” हे बोलत असतानाच डुंगरसिंगने खिशातून एक कागद काढून गुपचूप माझ्या हातात कोंबला. त्या कागदामध्ये माझी अंगठी गुंडाळलेली होती!

डुंगरसिंगच्या माणुसकीचा मला त्या दिवशी आलेला प्रत्यय मोठा विलक्षण होता.

आमच्या प्रियजनांकडून आलेली पत्रे रेड क्रॉसतर्फे आम्हाला मिळत असत. अर्थातच ती कॅम्प व्यवस्थापनाद्वारे उघडून, वाचून, सेन्सॉर केली जात. सुभेदार डुंगरसिंग ती पत्रे आमच्यापर्यंत पोचवत असे. आमच्यापैकी विवाहित आणि मुलेबाळे असलेल्या अधिकाऱ्यांच्या मुलांची नावे, इयत्ता, त्यांचे छंद अशा गोष्टीही हळूहळू डुंगरसिंगला पाठ झाल्या होत्या. त्या अधिकाऱ्यांशी तो त्याविषयी चर्चा करत असताना असे वाटे की जणू तो स्वतःच्याच कुटुंबाविषयी बोलत असावा. डाक येण्याच्या दिवशी एखाद्या अधिकाऱ्याच्या नावे एकही पत्र न आल्यास, डुंगरसिंग अगदी आत्मीयतेने त्या अधिकाऱ्याची समजूतही काढत असे.

डुंगरसिंगच्या चांगुलपणाची परतफेड करण्याची संधी एके दिवशी मला मिळाली. आमच्या बराकीच्या कोपऱ्यातल्या त्याच्या ठराविक जागी बसून तो हळूहळू हुंदके देत असल्याचे मला दुरूनच जाणवले. मी त्याच्या जवळ पोचेपर्यंत, आपले अश्रू पुसून शांत दिसण्याचा त्याने आटोकाट प्रयत्न केला. परंतु, मी त्याच्या खांद्यावर हात ठेवताक्षणी मात्र त्याचा बांध फुटला. सुभेदार डुंगरसिंग हमसून-हमसून रडू लागला. १५-१६ वर्षांची त्याची मुलगी अचानकच वारल्याचे त्याला नुकतेच पत्राद्वारे समजले होते. तिच्या अंत्यसंस्कारालाही तो जाऊ शकला नव्हता!

युद्धात जिंकलेला सैनिक असो किंवा पराभूत सैन्यातील एखादा युद्धकैदी असो, दोघेही मनुष्येच तर असतात. त्यांच्या भावभावनाही एकसारख्याच असतात. त्यांना आपापली दुःखे एकाच तीव्रतेने टोचतात किंवा आनंदही सारख्याच उत्कटतेने होत असतो!

कालांतराने, कैदेतून आमची सुटका होण्याची वेळ आली. सुभेदार डुंगरसिंग काहीशा विमनस्क अवस्थेत होता. त्याच्या मनात दोन परस्परविरोधी भावना उचंबळत असाव्यात असे जाणवले. परंतु, त्या दोन्ही भावना त्याच्या नैसर्गिक स्वभावधर्माला अनुसरूनच होत्या. युद्धकैद्यांची पहिली तुकडी रवाना झाली तेंव्हा त्याचे डोळे भरून आले होते. डोळ्यातले अश्रू कसेबसे मागे सारत तो चेहऱ्यावर उसने हसू आणू पाहत होता, पण त्याचे थरथरणारे ओठ सत्य सांगून गेले. आम्ही मायदेशी परतणार म्हणून तो आमच्या आनंदात सहभागी होता, पण आमच्या जाण्याचे दुःखही तो लपवू शकत नव्हता.

मनाने पर्वताएवढ्या विशाल अशा डुंगरसिंग नावाच्या माणसाचा अल्प सहवास मला लाभला हे माझे थोर भाग्यच म्हणायचे. तो जिथे असेल तिथे परमेश्वराने त्याला सर्व सुखे द्यावीत इतकीच माझी प्रार्थना आहे. त्या कठीण काळातले आमचे दिवस त्याच्यामुळे अविस्मरणीय होऊन गेले!

– समाप्त – 

[ब्रिगेडियर मेहबूब कादिर (सेवानिवृत्त) यांच्या मूळ इंग्रजी लेखाचा त्यांच्या पूर्वानुमतीसह केलेला भावानुवाद]

लेखक / अनुवादक : © कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

मो  9422870294

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “दुश्मनी में भी इक शराफत रखते हैं…” भाग – १ ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

? इंद्रधनुष्य ?

☆ “दुश्मनी में भी इक शराफत रखते हैं…” भाग – १ ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

‘लक्ष्य’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या तोंडी असलेला एक संवाद आठवत असेल, “ये इंडियन आर्मी है, हम दुश्मनी में भी एक शराफत रखते हैं… “

आपल्या मायभूमीकडे वक्रदृष्टीने पाहणाऱ्यांचे डोळे फोडायलाच हवेत, आणि भारताविरोधात उठलेला प्रत्येक हात खांद्यापासून कलम केलाच पाहिजे, याबाबत कधीच दुमत असणार नाही. परंतु सच्च्या सैनिकाने आपली नीतिमत्ता आणि माणुसकी विसरणे योग्य नव्हे, हेही तितकेच खरे आहे. वरकरणी ही दोन्ही विधाने परस्परविरोधी वाटू शकतात. पण कारगिल युद्धामधली आणि त्यापूर्वींचीही अनेक उदाहरणे सांगता येतील ज्यामध्ये भारतीय सैनिकांनी पराक्रम गाजवण्यात कधीच कुचराई केली नाही, परंतु, त्याच वेळी आपले माणूसपण हरवले नाही.

आज मी अशीच एक गोष्ट सांगणार आहे.

१९७१ साली बांगलादेश युद्धात पराभूत झालेल्या पाकिस्तानी सैन्यातल्या एका तत्कालीन कॅप्टनने कथन केलेला स्वानुभव त्याच्याच शब्दात…

डुंगरसिंग 

१९७२ सालच्या मार्च-एप्रिलच्या दरम्यान आम्हाला आग्र्याहून रांची येथील कॅम्प ९५ मध्ये हलवण्यात आले. त्या प्रवासादरम्यान आमच्यावर पहारा देणाऱ्या एका भारतीय सैनिकाने आमच्यापैकी एका अधिकाऱ्याला गोळी घालून ठार केले. त्याचे कारण काय हे तो पहारेकरीच जाणे! आमचा आणखी एक अधिकारी तर बेपत्ताच झाला. एकूणात, उत्तर हिंदुस्थानातल्या भीषण उकाड्यात आम्ही रेल्वेने केलेला तो प्रवास अक्षरशः जीवघेणाच ठरला होता.

आम्हाला आग्र्याहून तडकफडकी हलवण्याचे कारणही तसे सबळ होते. आग्र्याच्या युद्धकैदी शिबिरातून पळून जाण्याचा आमचा प्रयत्न नुकताच फसला होता. त्यामुळे ‘अतिशय डेंजरस कैदी’ असा शिक्का आमच्यावर बसलेला होता. त्या घटनेचे कठोर परिणाम होणार याची आम्हाला कल्पना होती आणि होईल ते भोगायची मानसिक तयारी आम्ही ठेवली होती. यात जगावेगळे असे काहीच नव्हते. युद्धात पकडले गेल्यास, शत्रूच्या तावडीतून शिताफीने निसटण्याचा जमेल तितका प्रयत्न करण्याचे बाळकडू प्रत्येक सैनिकाला प्रशिक्षणादरम्यान दिलेलेच असते. परंतु, युद्धकैद्यांचा पलायनाचा बेत फसल्यास, शत्रू काही त्यांना उत्तेजनार्थ बक्षीस निश्चित देणार नाही याचीही कल्पना प्रत्येकाला असतेच.

रांचीच्या कॅम्प ९५ मध्ये पोचताच आमची शिरगणती झाली आणि ५-६ जणांच्या गटात आम्हाला एकेका खोलीत डांबले गेले. या नवीन शिबिरामध्ये आमच्या सोबतीला, सरपटणारे, उडणारे नाना प्रकारचे किडे होते. त्याशिवाय उंदीर तर होतेच, पण त्यांचा पाठलाग करत येणारे हिरवट-पिवळे गवती सापदेखील आम्हाला अधूनमधून दर्शन द्यायचे.

रांचीवर निसर्गाची मात्र मेहेरनजर होती. स्वच्छ निळ्या आकाशाला टेकू पाहणारे आणि वाऱ्यासोबत डोलणारे गडद हिरवे माड आम्हाला खिडकीतून दिसायचे. चहाच्या मळ्यांनी तर आसपासच्या टेकड्यांवर जणू सोनहिरवे गालिचेच घातले होते. आमची दृष्टी पोचेल तिथपर्यंत हिरव्या रंगाच्या विविध छटांची नुसती पखरण होती. आसपास उगवलेले गवत तर अक्षरशः शांघायच्या मखमलीसारखे होते – मऊ आणि गुबगुबीत. वाऱ्याच्या झुळकीने गवत हलले की त्यावरची हिरवी छटाही बदलत असे. इथला पावसाळा मार्चमध्ये सुरु होई आणि नोव्हेंबरपर्यंत सुमारे ७५० इंच पाऊस पडे. कधी-कधी तर ठरवून एकत्र आल्यासारखे, तीन बाजूंनी एकाचवेळी ढग दाटून येत आणि पाऊस कोसळू लागे. निसर्गाचा असा अद्भुत आविष्कार मी कधीच कुठे पाहिलेला नव्हता.

इथल्या दमट वातावरणाचे तोटेही खूप होते. धुवून वाळत टाकलेल्या आमच्या कपड्यांवर किंवा टॉवेलवर संध्याकाळपर्यंत बुरशी लागत असे. आल्यानंतर काही दिवसातच आमच्या कातडी बुटांना प्रचंड दुर्गंधी येऊ लागली आणि ते वेडेवाकडे झाल्याने वापरणे अशक्य झाले. त्यामुळे, अंगावर खाकी रंगाच्या अर्ध्या चड्ड्या, बिनबाह्यांचे बनियन आणि पायात साध्या-सुध्या ‘हवाई चप्पल’ हाच वेष सगळ्यात सोयीस्कर आणि आरोग्याच्या दृष्टीने चांगला असल्याचे लक्षात आले. असल्या दमट हवेत शरीराची योग्य काळजी न घेतल्यामुळे आमच्या शरीरावरच्या विविध बेचक्यांमध्ये घाम साठून राही. त्यामुळे, अंगावर उठलेले उन्हाळी फोड, खरूज आणि नायटे यांनी आम्ही अक्षरशः बेजार झालो. त्या जागी लावायला एक गुलाबी रंगाचे मलम आम्हाला दिले गेले होते. शरीराच्या बेचक्यांमध्ये ते मलम लावून, ती जागा उन्हात वाळू देणे हाच एकमेव उपाय होता. सकाळी-सकाळी, खुशाल नग्नावस्थेत उन्हात पहुडलेल्या आम्हा कैद्यांचे ते बीभत्स दृश्य पाहण्याची शिक्षा, कॅम्पच्या वॉचटॉवरवर पहारा देणाऱ्या भारतीय शिपायांना भोगावी लागे! त्याला मात्र आमचा नाईलाज होता.

ब्रिटीशकालीन रांची कॅन्टोन्मेंटच्या एका कोपऱ्यात आमचा युद्धकैदी कॅम्प होता. अगदीच कामचलाऊ अशा बराकींमध्ये आम्हाला मिळालेल्या खोल्या तशा प्रशस्त होत्या. एकेका खोलीला लागूनच संडास-बाथरूम होती. सर्वांसाठी एकच सामायिक स्वयंपाकघर आणि जेवणाचा हॉल होता. खिडक्यांवर गज ठोकून त्या बंदिस्त केलेल्या होत्या आणि बराकीचा दरवाजाही रात्रीच्या हजेरीनंतर बाहेरून कुलूपबंद केला जात असे. आमची खोली बराकीच्या एका टोकाला होती. तिथून अक्षरशः ढांगेच्या अंतरावर असलेले कुंपण आम्हाला सतत भुरळ घालत असे. जवळजवळ त्या कुंपणाला लागूनच दाट जंगल सुरु होत होते आणि त्यापलीकडे पाटण्याला जाणारा रस्ता होता. कॅम्पमध्ये पोचल्यानंतर आमच्यापैकी काहीजण रेडक्रॉसतर्फे मिळालेली पुस्तके वाचण्यात दंग झाले, तर काहीजणांनी धार्मिक वाचन व प्रार्थनेला वाहून घेतले. काही थोडेजण मात्र अगदीच सैरभैर झाले आणि अखेरपर्यंत निराशेच्या गर्तेतच राहिले.

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

मो  9422870294

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares