मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पाण्यावर तरंगणारी मूर्ती…” – लेखक – अज्ञात ☆ श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “पाण्यावर तरंगणारी मूर्ती”  – लेखक – अज्ञात ☆ श्री सुनीत मुळे ☆

भगवान विष्णूची शेषशय्येवर, विश्रांती घेत असलेली मूर्ती… 

  • आता येणारी आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी होय. विष्णु समुद्रात शेष शय्येवर चार महिने चातुर्मास विश्रांती घेतात.
  • गेली १३०० वर्षे पाण्यावर तरंगत असलेली ही श्री भगवान विष्णूंची १४ फुटी दगडी मूर्ती.
  • काठमांडूपासून ९ कि. मी. अंतरावर असलेल्या ‘बुद्धनिकंध’ या गावी हे देऊळ आहे.
  • एवढी मोठी एकसंध दगडी मूर्ती गेली १३०० वर्षे पाण्यावर तरंगते आहे, हा ईश्वरी चमत्कारच !

माहिती प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ठकी – कायमची हरवलेली जुनी लाकडी बाहुली… लेखक : श्री मकरंद करंदीकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलभा तेरणीकर☆

सुश्री सुलभा तेरणीकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ठकी – कायमची हरवलेली जुनी लाकडी बाहुली… लेखक : श्री मकरंद करंदीकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलभा तेरणीकर 

“ठकी”- कायमची हरवलेली जुनी लाकडी बाहुली !

पूर्वी लहान मुलं भातुकलीचा खेळ खेळत असत. भातुक या शब्दाचा अर्थ खाऊ असा आहे ! भगवान श्रीकृष्णाच्या बालपणातील विटी दांडू आणि चेंडू, सुमारे ५००० वर्षांपूर्वी मोहेंजोदारो मध्ये सापडलेली मातीची खेळणी, एका इटालियन बेटावर ४००० वर्षांपूर्वी सापडलेली दगडी बाहुली, ग्रीस – चीन – रोममध्ये सापडलेली खेळणी ही माणसाच्या या अशा क्रीडा प्रेमाचे विश्वरूप दर्शन घडवितात.

आपल्याकडे पूर्वी प्रत्येक घरातील स्वयंपाक या विभागाचे प्रमुखपद हे नात्याने, वयाने ज्येष्ठ असलेल्या स्त्रीकडे आपोआपच यायचे. शालेय शिक्षणाचा प्रसार कमी होता. पुढच्या पिढीला पारंपरिक ज्ञान हे घरातूनच मिळायचे. मुलींना ते घरातील स्त्रियांबरोबर वावरतांना मिळत असे. खेळामध्ये मातीची भांडी, लाकडी बोळकी – बुडकुली असायची. या खेळण्यांच्या साहाय्याने घरातील मोठ्या स्त्रिया जशा वागतात तसे वागण्याचा प्रयत्न म्हणजे पूर्वीचा भातुकलीचा खेळ ! आपल्याकडे पूर्वी घरोघरी ठकी नावाची, लाकडाची एक ओबडधोबड बाहुली असायची. एका लाकडाच्या त्रिकोणी ठोकळ्यातून ही ठकी कोरली जात असे. अनेकदा ही ठकी ठसठशीत कुंकू लावलेली, लुगडे नेसलेली, नाकात नथ व डोक्यात फुलांची वेणी घातलेली असे. तरीही या बाहुलीला अंघोळ घालणे, कपडे घालणे, दूध पाजणे, भरविणे, झोपविणे हा त्यावेळच्या मुलींच्या खेळण्याचा भाग असे. कांही ठिकाणी ही ठकी रंगविलेली असायची. ठकी, ठेंगणी – ठुसकी, ठकूताई, ठमाबाई, ठेंगाबाई अशी मराठीतील ठ वरून सुरु होणारी नावे आणि विशेषणे या बाहुलीसाठी कायमची राखीव असत. ठकी ही फारशी स्मार्ट वगैरे न वाटता कांहीशी गावंढळ, मंद, ढ वाटत असे. त्या काळात शिक्षणामध्ये फारशी गती नसलेल्या मुलींचे लग्न लवकर उरकून टाकत असत. सर्वात महत्वाचे म्हणजे अस्सल मराठी बाहुलीचे रुप ल्यालेली ही ठकी बाहुली अशा मुलींचे एक प्रतीक ठरले होते. पुलंचे चितळे मास्तर हे त्यांच्या वर्गातल्या गोदी गुळवणीला गोदाक्का म्हणून हाक मारीत असत. तिचे वर्णन या ठकीला साजेलसे आहे. अशा ठक्या संसार मात्र चांगला करीत असत. ठकीची घराघरातील एकच बाहुली ही अनेक वर्षे लहान मुलींना खेळायला पुरत असे. पण ती फारच तुटकी फुटकी झाली तर तिचा उपयोग जात्याचा खुंटा ठोकणे, कुणाला तरी फेकून मारणे असल्या हलक्यासलक्या कामांसाठी केला जात असे. परंपरांच्या चाकोरीतच अडकलेल्या स्त्रीचे प्रतीक म्हणून ठकीचे छायाचित्र अनेक पुस्तकांमध्ये, मुखपृष्ठांवर पाहायला मिळते. दूरदर्शनवरील वृत्त निवेदिका आणि विविध कार्यक्रम सादर करणाऱ्या सौ. दिपाली केळकर यांनी ठकी, भातुकली, भातुकलीची विविध छोटी भांडी, खेळणी इत्यादींवर आधारित, ” खेळ मांडीयेला ” हे एक सुंदर पुस्तक लिहिले आहे.

भातुकली या खेळात केव्हांतरी एकदा बाहुला बाहुलीच्या लग्नाचा कार्यक्रम होत असे. फक्त मुलींच्या या खेळात मग अशा वेळी भटजी, वऱ्हाडी म्हणून मुलगेही सामील होत असत. या ठकीला नवरा म्हणून मग एक तितकाच ओबडधोबड बाहुला असायचा. त्याचे नावही देवजी घासाड्या, ठोंब्या, ठक्या असे काहीतरी असायचे.

आपली आई, आजी, आत्या, मावशी या दिसायला रूपवान असणे कधीच अपेक्षित नसते. तसेच या ठकीचे सुद्धा होते. ती भलेही सुंदर नसेल पण तिचे अस्तित्वच खूप सुंदर होते, भावपूर्ण होते. अनेक मुलींना तिने मोठे होताना पाहिलेले होते. ठकी ही केवळ एक बाहुली नसून ती अनेक पिढ्या, मुलींशी गुजगोष्टी केलेली एक संस्कृती होती.

अशा या ठकीची गरज आणि अस्तित्व जगभर होते, असे दिसते. भारतातच अनेक प्रांतांमध्ये अशा त्रिकोनी आकारात साकारलेल्या अनेक बाहुल्या आढळतात. (सोबतचे फोटो अवश्य पाहा). पण ठकीच्या तुलनेत त्या सौंदर्यवती दिसतात. रशियन बाहुली मातृष्का या नावाने ओळखली जाते. तर ९ मार्च १९५९ रोजी जन्माला आलेली अमेरिकन सुंदर बार्बी बाहुली आता ६७ वर्षांची होईल.

अशा सुंदर, रूपवान, फॅशनेबल आधुनिक बाहुल्यांपेक्षा ठकी म्हणजे मायेच्या आई, आजी, आत्या, मावशी यांच्यासारखी वाटते. पण तिची कायमची रवानगी आता पुरातन वस्तू संग्रहालयात झाली आहे.

लेखक : श्री मकरंद करंदीकर

प्रस्तुती : सुश्री सुलभा तेरणीकर 

मो. 8007853288 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “महान विचारवंतांचे ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलचे विचार…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “महान विचारवंतांचे ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलचे विचार…☆ संकलन व प्रस्तुती : जगदीश काबरे ☆

महान विचारवंतांचे ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलचे विचार –

1) प्रसिद्ध दिवंगत शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग म्हणतात, “ईशनिंदेबाबत मी देवाला घाबरत नाही (कारण तो नाहीच हे मला माहितीये) मी त्याच्या भक्तांना मात्र घाबरतो. विश्वात कोणी सिद्ध केलं, की देव आहे, तर मी स्वतःचं सर्वस्व त्याला देऊन टाकीन”.

2) तत्त्वज्ञ सॉक्रेटिस म्हणतात, “ईश्वर हे केवळ शोषणाचं साधन आहे”.

3) तत्त्ववेत्ता कार्ल मार्क्सच्या मते ईश्वराचा जन्मच मुळात आपले वर्चस्व राखण्यासाठी हितसंबंधीयांनी केलेला आहे.

4) ”जो देव देवळात उजेड पाडू शकत नाही, तो तुमच्या जीवनात काय पाडणार?” अशा शब्दांत संत गाडगेबाबा आपल्या कीर्तनांतून लोकांना खडसावतात.

5) शहीद भगतसिंग म्हणतात, “या देशातले आस्तिक तरुण माझ्या नजरेत नामर्द आहेत. “

6) प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या मते, “नास्तिक माणसाचा स्वतःवर विश्वास असतो आणि तो इतरांवर प्रेम करतो”.

7) डॉ. श्रीराम लागू यांनी तर ‘देवाला रिटायर करा!’ अशी हाळी दिली.

8) बिल गेट भारतीय लोकांविषयी म्हणतात, ”या देशातल्या मंदीरं आणि मस्जीदमध्ये जाणाऱ्या रांगा वाचनालयात जातील तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल. “

9) स्वामी विवेकानंद म्हणतात, ”माझा देश बिनडोक्याचा बाजार आहे. इथे चटणी कोरडी खातील, अन् तेल दगडावर ओततील!” 

10) “देव दगडात नसून माणसांत आहे. देव-देवळं आणि देवाधर्माच्या नावानं चाललेली कर्मकांडं ही पुरोहितांची रोजगार हमी योजना आहे. देवळात आपलं शोषण होतं, हेच भक्तांना कळत नाही. देव असलाच तर भटांच्या पोटात आहे, मंदीरात नाही…   ” हे प्रबोधनकार ठाकरे सर्वसामान्यांच्या मनावर ठसवत आले.

©  जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १८ — मोक्षसंन्यासयोगः — (श्लोक ५१ ते ६०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १८ — मोक्षसंन्यासयोगः — (श्लोक ५१ ते ६०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

बुद्ध्या विशुद्ध्या युक्तो धृत्यात्मानं नियम्य च ।

शब्दादीन्विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च ॥ ५१ ॥ 

*

विविक्तसेवी लघ्वाशी यतवाक्कायमानसः । 

ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः ॥ ५२ ॥ 

*

अहङ्कारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहम्‌ । 

विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते ॥ ५३ ॥ 

*

शब्दादी विषयत्याग भोजन हलके नियमित शुद्ध  

एकान्ती वास गात्रांतःकरण सात्विक संयमात शुद्ध

कायामनवैखरी अंकित राग-द्वेष करितो पूर्ण विनाश

अहंकार बल दर्प काम क्रोध परिग्रह त्याग वैराग्याश्रय

ध्यानयोगपरायण नित्य निर्मम मनुज  जो शांतियुक्त 

एकरूप  ब्रह्म्यालागी व्हाया स्थिर खचित होतसे पात्र ॥५१, ५२, ५३॥

*

ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति । 

समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम्‌ ॥ ५४ ॥ 

*

ब्रह्मभूत प्रसन्न योगी नाही शोक ना वासना त्याते 

सर्वभूतांपरी समभाव परा भक्ती मम तया लाभते ॥५४॥

*

भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः । 

ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम्‌ ॥ ५५ ॥ 

*

पराभक्तीच्या योगाने यथार्थ जाणे तो मजला

माझ्याठायी प्रविष्ट होतो जाणूनी मग तो मजला ॥५५॥

*

सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः । 

मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम्‌ ॥ ५६ ॥ 

*

समग्र कर्मे करितो राहुनी परायण माझिया चरणा

मम कृपे त्या अखंड प्राप्ती परमपदाची सनातना ॥५६॥

*

तसा सर्वकर्माणि मयि संन्यस्य मत्परः । 

बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव ॥ ५७ ॥ 

*

तुझ्या सर्व कर्मा मजसी अर्पुनिया मनाने

निरंतर मत्परायण हो मजठायी चित्त बुद्धीने ॥५७॥

*

मच्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात्तरिष्यसि । 

अथ चेत्त्वमहङ्कारान्न श्रोष्यसि विनङ्क्ष्यसि ॥ ५८ ॥ 

*

चित्त तुझे मजठायी असता सकल संकटे तू तरशील 

अहंकारे लंघता मम वचने परमार्थी भ्रष्ट तू होशील ॥५८॥

*

यदहङ्कारमाश्रित्य न योत्स्य इति मन्यसे । 

मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यति ॥ ५९ ॥ 

*

अहंकार धरुनी म्हणशी युद्ध ना मज करवेल

व्यर्थ तुझा हा निश्चय प्रकृती तव युद्ध करवेल ॥५९॥

*

स्वभावजेन कौन्तेय निबद्धः स्वेन कर्मणा । 

कर्तुं नेच्छसि यन्मोहात्करिष्यस्यवशोऽपि तत्‌ ॥ ६० ॥ 

*

स्वभावाने अपुल्या कौंतेया निबद्ध असती अपुली कर्मे

अनिच्छा तरी स्वाभाविकता करशिल परवशतेने कर्मे ॥६०॥

 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ||◆||  नंदकुमार  सप्रे  ||◆|| – लेखक : श्री सुनील होरणे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ ||◆||  नंदकुमार  सप्रे  ||◆|| – लेखक : श्री सुनील होरणे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

मध्यंतरी  एका अंत्यविधीसाठी अमरधाम मध्ये गेलो होतो. जवळचे नातेवाईक आणि

मृताच्या घरचे लोक चितेच्या ओट्याजवळ तयारी करत होते. इतर जे परिचित हजेरी लावण्यासाठी आले होते, ते नेहमी प्रमाणे समोरच्या पायऱ्यांवर एकमेकांची ख्याली खुशाली विचारत हास्य विनोदात दंग होते. 

सर्व विधी पूर्ण झाल्यावर एक गृहस्थ तिथे आले. त्यांच्या हातात एक पिशवी होती. त्या पिशवीत दोन तीन पाण्याच्या बाटल्या आणि एक थर्मास होता. मृताच्या घरच्या लोकांना त्याने पाणी पिण्यास दिलं आणि नंतर पेपर कपमध्ये चहा प्यायला दिला. कोणी नातेवाईक असावेत असं मला वाटलं.

या घटनेनंतर बऱ्याच दिवसांनी मी नोबल हॉस्पिटलमध्ये कोणाला तरी भेटायला गेलो होतो. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर बरेच लोक बसले होते. बहुधा त्यांच्या कोणा नातेवाईकांचं आत ऑपरेशन चालू असावं. आणि अचानक बघितलं तर त्या दिवशी अमरधाम मध्ये दिसलेले ते गृहस्थ इथं देखील त्या बसलेल्या लोकांना चहा देत होते. आता माझी उत्सुकता वाढली. थोड्या वेळाने सर्वांना चहा देऊन ते थोडे बाजूला आले, मी ताबडतोब त्यांच्या जवळ गेलो….. 

” नमस्कार !” मी म्हटलं. त्यांना हे अपेक्षित नसावं… ते कावरे बावरे होऊन माझ्याकडं बघू लागले. मी

पुन्हा नमस्कार केला, या वेळी त्यांनी फक्त मान हलवली. 

” आपलं नाव काय? ” मी विचारलं. त्यांचा पुन्हा प्रश्नार्थक चेहरा. यावेळी कपाळावर आठया देखील.  

“तुमचं नाव सांगा.” त्यांनी तुटकपणे मलाच उलटा प्रश्न केला. आता मी त्यांच्या जवळ गेलो, त्यांचे दोन्ही हात हातात घेतले आणि म्हणालो, 

” अहो महाराज, माझं नाव प्रशांत कदम. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं म्हणून नाव विचारलं.

आपण दोन मिनिटं बोलू शकता का?”

“नाही.” समोरून फटकन उत्तर आलं. आता मला धक्के पचवायची सवय झाली होती.

“नाही म्हणजे आत्ता नाही कारण आत्ता मला आणखी बऱ्याच ठिकाणी जायचंय. आपण नंतर कधीतरी

भेटू. आणि माझं नाव नंदू… म्हणजे नंदकुमार सप्रे.”

…. एवढं बोलून ते तरा तरा चालायला लागले. मी त्यांच्या पाठमोऱ्या छबी कडे बघतच राहिलो. साधारण साडेपाच फूट उंची,  मध्यम किंवा त्यापेक्षा बारीक शरीरयष्टी, अंगात पांढरा शर्ट आणि पायजमा, पायात चपला…  अहो हा माणूस बोलायला तयार नाही.

…. पण एक गोष्ट लक्षात आली. याला कुठंतरी काहीतरी दुःख आहे, वेदना आहेत. आणि त्या दिवसापासून

माझा त्याच्यातील इंटरेस्ट वाढू लागला. आता याला पुन्हा एकदा भेटलं पाहिजे.

आणि तो दिवस लवकरच आला. मी कुठंतरी चाललो होतो आणि हे महाराज रस्त्याच्या कडेला सायकल हातात धरून उभे होते. बहुधा कोणाची तरी वाट पहात असावेत. मी ड्रायव्हरला गाडी बाजूला घ्यायला सांगितले आणि पटकन खाली उतरून सप्रेच्या समोर जाऊन उभा राहिलो.

“सप्रे कोणाची वाट बघताय?” मी.

“नाही वाट नाही बघत, सायकल पंक्चर झालीय.”

“अरेच्चा, थांबा आपण पंक्चर काढायची व्यवस्था करू.” मी ड्रायव्हरला बोलावून सायकल पंक्चर

काढायला पाठवलं.

“अहो तुम्ही कशाला त्रास घेता, मी आणली असती करून.” सप्रे कसनुसा चेहरा करून म्हणाले.

“असू द्या हो सप्रे, चला आपण तोपर्यंत गाडीत बसून बोलू.”  सप्रे अक्षरशः बळजबरीने गाडीत येऊन बसले.

अतिशय अस्वस्थ झाले होते. मी बोलायला सुरुवात केली, 

“सप्रे ही चहाची काय भानगड आहे? जरा सांगता का?”  सप्रे गप्प. मला कळेना हा माणूस असा का वागतोय, धड बोलत देखील नाही… आणि माझं लक्ष्य त्यांच्या चेहऱ्याकडे गेलं, अहो हा माणूस रडत होता. त्याच्या दोन्ही डोळ्यातून अश्रूच्या धारा वहात होत्या. मला एकदम अपराधी असल्यासारखं वाटलं. मी दोन्ही हातांनी सप्रेना धरलं … 

“सप्रे मला माफ करा. तुम्हाला दुखवायचा माझा हेतू नव्हता. जाऊ द्या, मला काही सांगू नका पण

कृपा करून तुम्ही शांत व्हा. पुन्हा मी तुम्हाला असले प्रश्न विचारणार नाही. I am sorry.”

दोन तीन मिनिटांनी सप्रे शांत झाले आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली…. 

 ” प्रशांतजी, आजपर्यंत या विषयावर मी कोणाशी बोललो नाही. पण आज मी तुम्हाला सगळं सांगणार, याचं कारण असं आहे की, फक्त तुम्ही एकट्यानेच हा प्रश्न मला विचारला. मी आणि माझी पत्नी दोघेही सरकारी अधिकारी. मुलगा आणि सून दोघेही अमेरिकेत. तीन वर्षांपूर्वी पत्नीचे कोविडमध्ये निधन झाले. आम्ही दोघेही बाधित होतो. मला हॉस्पिटल मिळालं, तिला खाजगी हॉस्पिटल मिळालं नाही म्हणून सरकारी दवाखान्यात ऍडमिट केलं आणि चौथ्या दिवशी ती गेली.  इथं मी कोणालाही दोष देऊ इच्छित नाही, कारण

परमेश्वरावर माझा पूर्ण विश्वास आहे. तिची वेळ भरली होती, त्यामुळे ती गेली, एवढंच सत्य आहे. आणि मुळातच एकदा माणूस गेल्यावर त्याची कारणमीमांसा तपासत बसू नये असं मला वाटतं. तिला चहा फार आवडायचा, दिवसातून चार पाच वेळा तरी ती चहा घेत असे. दुर्दैवाचा भाग असा की तिला हॉस्पिटलमध्ये चार दिवसात एकदाही चहा मिळाला नाही. आणि या गोष्टीचं मला सगळ्यात जास्त वाईट वाटलं आणि त्याच वेळी मी ठरवलं की आपण काहीतरी करायचं.  माणूस गेल्यानंतर त्याचे जवळचे नातेवाईक जास्त दुःखी असतात. आणि त्यांना काही हवंय का? हे देखील कुणी विचारत नाही. म्हणून मी थेट स्मशानभूमीत जाऊन ही सेवा देतो. त्यांच्या समाधानी चेहऱ्यात मला माझ्या पत्नीचा चेहरा दिसतो. हॉस्पिटलमध्ये गंभीर पेशंटचे नातेवाईक अतिशय तणावात असतात. त्यांना मी जाऊन भेटतो. चहा देतो, चौकशी करतो आणि दिलासा देतो. थोडा वेळ का होईना पण त्यांना बरं वाटतं. मी रिटायर असल्याने माझ्याकडे भरपूर वेळ आहे. सुदैवाने आर्थिक परिस्थिती चांगली आहे. मोठा बंगला आहे आणि मी एकटाच आहे. म्हणून तिथं

पंधरा अनाथ विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केलीय.”

……. मी प्रचंड भारावून गेलो होतो. काय बोलावे हे देखील मला कळत नव्हते….. 

“सप्रे तुम्ही फार मोठं काम करताय, You are great.” एवढंच मी बोलू शकलो. 

सप्रेची सायकल तयार होऊन आली होती. सप्रे गाडीतून उतरले, मला त्यांचं व्हिजिटिंग कार्ड दिलं आणि ते निघून गेले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत मी फक्त नतमस्तक झालो.

त्यानंतर सप्रेची आणि माझी गाठ भेट नाही. एक दिवस कोणीतरी सप्रे गेले असं सांगितलं. मी सप्रेच्या घरी गेलो. बंगल्याच्या गेटवर मोठा बोर्ड होता .. “मालती सप्रे मेमोरियल ट्रस्ट” . आत एक जोशी नावाचे मॅनेजर होते. त्यांनी सांगितलं इथं राहणारे विद्यार्थीच आता सप्रेचं काम करतात.

…… मला आनंद चित्रपटातला शेवटचा प्रसंग आठवला.

….. राजेश खन्ना मरतो आणि नंतर अमिताभ तिथं येतो. त्यावेळी तो दोन वाक्य बोलतो.

“आनंद मरा नहीं,  आनंद मरते नहीं।” 

लेखक : श्री सुनील होरणे 

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “जुवे बेट…” – लेखक – अज्ञात ☆ श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “जुवे बेट”  – लेखक – अज्ञात ☆ श्री सुनीत मुळे ☆

‘पृथ्वीवरचा स्वर्ग’ असे कोकणाचे वर्णन केले जाते. याच कोकणात सुंदर समुद्र किनाऱ्यांसह अनेक छुपी पर्यटनस्थळ आहेत. यापैकीच एक आहे चारही बाजूने पाण्याने वेढलेले छुपं गाव. इथं घराबाहेर होड्या पार्क केलेल्या असतात. रत्नागिरीतून राजापूर आणि मग जैतापूर असा बस प्रवास. यानंतर मग जैतापूरहून होडी किंवा बोटीतून जुवे गावात पोहचता येते. पर्यटन दृष्ट्या या गावाचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला नाही. यामुळे हे ठिकाण पर्यटकांपासून अलिप्त आहे. नारळी पोफळीच्या बागा. मधोमध भुई आणि चहुबाजूंनी निळेशार पाणी. या गावचे निसर्ग सौंदर्य मन मोहून टाकणारे आहे. राजापूरची अर्जुना नदी अर्धचंद्राकृती आकार जिथे घेते तिथेच हे सुंदर ठिकाण आहे. चारही बाजूंनी समुद्रांनी वेढलेल्या या गावात जाण्यास होडी शिवाय पर्याय नाही. जैतापूर, बुरंबेवाडी, धाऊलवल्ली यांच्या मध्ये जैतापूर खाडीत जुवे हे गाव आहे. जैतापूर जवळ धाऊलवल्ली जवळ हे जुवे बेट आहे. कोकणातील या छुप्या बेटाचे नाव आहे जुवे बेट.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हळद कुंकू लावून ओटी भरणारं उस्तादांचं घर…  लेखक : श्री दीपक प्रभावळकर ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ हळद कुंकू लावून ओटी भरणारं उस्तादांचं घर…  लेखक : श्री दीपक प्रभावळकर ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

आता कलेला धर्मचौकटीत बांधणार काय?

उस्ताद झाकीर हुसेन गेले. त्यांना अनेकदा प्रत्यक्ष ऐकले, पण प्रत्यक्षात कधी भेटू शकलो नाही. अगदी कौटुंबिक जिव्हाळा आणि नाते असूनही !

कहाणीची सुरुवात होते, माझा मावसभाऊ संजूदादापासून. संजूदादाला लहानपणापासूनच तबल्याची नितांत आवड, सांगलीचा संजूदादा मिरजेच्या भानुदास बुवा गुरव यांच्याकडे तबला शिकत होता. तो साधारण 16 वर्षाचा असताना बुवांना देवाज्ञा झाली. आता संजूच्या तबल्याचे काय होणार, याची काळजी लागली. त्याचवेळी कोल्हापुरात झाकीरभाईंचा कार्यक्रम होता. आमची आत्या सुनंदा म्हणजे आमची ताईआत्या आणि संजूची थोरली बहीण सुहासिनी उर्फ आमच्या गोट्याताई हे संजूला घेऊन झाकीरभाईंना ऐकावायला गेले. सारं सभागृहत मंत्रमुग्ध झालं असलं तरी झाकीरभाइं&च्या बोटावर संजूदादाच्या काळजाचे ठोके नाचत होते. भाईंना ऐकून झालं. सारेच सांगलीला परतले.

इथं सुरु झाला प्रवास

तीनच दिवसात झाकीरभाई सांगलीत येणार होते. भाईंना ऐकून झालं होतं. आता त्यांच्याशी बोलायचं हे साऱ्या कुटुंबाने ठरवले आणि तुफान गर्दीत ते घडलेही. संजूदादाची ओळख करून दिली. जवाहिऱ्याला हिऱ्याची परख असते. चार मिनिटाच्या ओळखीत झाकीरभाइंनी तू मुंबईला ये आणि आब्बाजींकडे म्हणजे पंडित उस्ताद अल्लारखाँ यांच्याकडे शिक.

कला पूजा पूर्णत्वास आली…. दिवाळीत घरापुढे किल्ला करणाऱ्या पोराला अचानक हिमालयाच्या गिर्यारोहणाचे निमंत्रण मिळाल्यासारखंच होते.

अब्बाजी तुसी धन्य हो

संजूदादा आत्या आणि गोट्याताई मुंबईत घर शोधत शोधत भाईंच्या घरी पोहोचले. आता प्रश्न होता, संजूच्या मुंबईत राहण्याचा, ते आर्थिकदृष्ट्या अवघड होते. आब्बांनी एका वाक्यात तो सोडवला. अल्लारख्खांनी आपल्या आपर्टमेंटच्या पार्किंगच्या जागेत एक खोली बांधून संजूदादाच्या राहण्याची व्यवस्था केली. आणखीही तीन विद्यार्थी नव्हे नव्हे शिष्य तिथेच राहत होते.

झालं, संजूदादाचा तबला पुन्हा सुरू झाला. तुमचं काम, लगान गुरूकडे तुम्हाला घेऊन जाते, ते झालं. गुरूमंडळात आब्बाजींसाठी आणि झाकीरभाईंसाठी संजू आवडता झाला. झाकीरभाई अनेकादा दौऱ्यावर असत. झाकीरभाईंना आणखी दोन भाऊ आहेतच फजल आणि तोफीक तरी घरच्या अनेक जबाबदाऱ्या संजूवर आल्या होत्या. संजूदादा हा पंडीत उस्ताद अल्लारख्खाँ उर्फ आब्बाजींचा चौथा मुलगा होता. आब्बाजींचे पथ्य पाणी पाहणे, आम्माजी यांना हाताला धरून फिरवून आणणे हे संजूने स्वत:च सुरू केले. हे त्याला कुणी सांगितले नव्हते. घरच्या जबाबदाऱ्या कोणी दिल्या नव्हत्या, त्यान स्वत: घेतल्या होत्या.

संजूचे तबलाज्ञान हे सुद्धा इतकं वाढलं होतं की, मैफिलीला आब्बाजी त्याला सोबत घेऊन जात. आब्बाजींसोबत संगत करण्याचं अहोभाग्य संजूदादाला लहान वयातच लाभलं. अनेक मैफिलींना आब्बाजी संजूला एकटे पाठवत.

संजूचा तबला बघून झाकीरभाईंनी त्यांच्याच घरी शास्त्रोक्त पद्धतीने संजूचं ‘गंडाबंधन’ केले.

ब्राह्मणाची माऊली संजू घरी आनंदी

सांगलीच्या माझ्या आत्याला पोराची आठवण यायची. त्याकाळी सांगलीहून मुंबईला जायचे, लेकाला भेटायचे, पण रहायचे कुठे? हा प्रश्न असायचा. आत्या एकदा मुंबईला गेलीच, गॅरेजमध्ये लेकाला भेटल्यानंतर आम्माजींनी त्यांना वर बोलावून घरी राहायला सांगितले. आत्या झाकीर हुसेन यांच्या घरी एक दिवस नाहीतर चार दिवस राहून सांगलीला परतली. पुढे हा शिरस्ताच सुरू झाला. आत्या आठ आठ दिवस झाकीरभाईंच्या घरात राहायची.

संजूदादा झाकीरभाईंच्या घरातला अविभाज्य घटक होता. बाह्मणा घरचं पोरं मुसलमानाच्या घरात नांदत होतं. ठसठशीत पुंकू लावणारी आत्या आम्मीजींची अनेकदा सावली बनून राहत. गोट्याताई सुद्धा अनेकदा झाकीरभाईंच्या बहिणीसारखी त्यांच्या घरी राहत.

आम्हा घरी नाही धर्म आम्ही एकाची लेकरे

पुढे गोट्याताईचं लग्न झालं. भाऊजी सुनील आणि गोट्याताई गुजरातला निघाले होते. वाटेत संजूला भेटून जाऊन असं ठरवून ते संजूला भेटायला गेले. नेमके त्यादिवशी झाकीरभाई, आब्बाजी हे सारेच घरी होते. ताई-भाऊजी दोघांचा मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी निघण्याची गडबड असताना आम्माजींनी ताईला थांबवलं. पाटावर बसवलं आणि हळद कुंकू, अक्षदा (कुंकूमिश्रीत तांदूळ) लावून खणानारळानं तिची ओटी भरली. लेक जावायांनी साऱ्यांच्या पाया पडून ‘अष्टपूत्र सौभाग्यवती भव’ हे आशीर्वाद घेतले.

मी ढगाळ फाडतोय, मला ताकद द्या

ताई, भाऊजी गुजरातला पोहोचले, इकडं संजूदादाचं तबला करिअर बहरत होतं. दुर्देवाने संजूदादाला जाऊन काही वर्षे झालीत.

काल भाई पण गेले.. ,

अस्वस्थपणे हा सारा घटनाक्रम पाहताना रक्ताचे अश्रू वाहत होत. धर्मांधतेचे किटण चढलेले आपण जीणं जगतोय, कुठूनं आलं हे सगळं मळभ.

हिंदुस्थानावर कोसळू पाहत असलेला धर्मांधतेचा ढग माझ्या इवलाश्या हाताने काढण्याचा प्रयत्न करतोय. माझी ताकद कमी पडतेय, का कोणाच्या लक्षात येत नाही की आज आपण रंग, प्राणी सुद्धा धर्मामध्ये वाटले आहेत. कला सुद्धा रंगामध्ये बांधण्याचे प्रयत्न होत आहेत.

मुसलमानाच्या घरात बाह्मणाचा पोरगा जणू श्रीकृष्णाप्रमाणे वाढला. आणि मुस्लीम घरामध्ये हळद कुंकू, अक्षदा आणि नारळही असायचा. या साऱ्या घटनेचा परीसस्पर्श होऊन सुद्धा होऊनही मी सोनं का झालो नाही किंवा या विलक्षण घटनेचं परीस घेऊन समाजात मी सोनं का घडवू शकत नाही.

धर्मांमध्ये विभागणी करणाऱ्या लोकांच्या हातात कला लागू नये, आणि जे क्षेत्रे हाती लागली आहेत, त्यांना बाजूला करण्याचे बळ झाकीरभाईंच्या आत्म्याने द्यावे, हीच तुमच्या आमच्या ईश्वर आणि अल्लाकडे मागणी.

लेखक : श्री दीपक प्रभावळकर 

 – 9325403232 / 9527403232

प्रस्तुती : अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पाढे… लेखक : श्री सुनील भातंब्रेकर ☆ प्रस्तुती व प्रतिक्रिया – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

☆ पाढे… लेखक : श्री सुनील भातंब्रेकर ☆ प्रस्तुती व प्रतिक्रिया – श्री सुहास सोहोनी ☆

पूर्वीच्या काळी पाहुणे किंवा नातेवाईक वगैरे घरी आले की पढवून ठेवल्यासारखा एक प्रश्न हमखास विचारीत, ‘पाढे पाठ आहेत का रे?’ आपण ‘हो’ म्हटलं की ‘कितीपर्यंत?’ असा पुढचा प्रश्न! ‘पंधरा पर्यंत!!’ असं अभिमानाने सांगितलं की ‘तेराचा म्हणून दाखव पाहू!!’ तो कसाबसा अडखळत संपवला की ‘आता ‘चौदाचा म्हणून दाखव’ असा प्रश्नोपनिषादाचा पाढा चालू होई. कशी तरी सुटका करून घ्यावी लागत असे.

पाढे पाठ करायची एक सुंदर प्रथा का कोण जाणे मागे पडली. ‘बे एके बे’ पासून सुरु होणारे पाढे ‘तीस दाहे तीनशे’ पर्यंत म्हणता येणे ही हुशारीची – पाठांतराची परिसीमा होती. सर्वसाधारण मुलं ‘बारा’पर्यंत तरबेज असत. तेराला पहिली थोडी पडझड व्हायची. चौदा, पंधरा, सोळा हळूहळू का होईना ठीक जायचे. सतरा पासून अजून काही बुरुज ढासळायचे आणि एकोणीसला शरणागतीच्या पांढरे निशाण फडकावले जायचे. वीसला अर्थ नसायचा आणि एकवीसच्या पुढचे पाढे म्हणण्याची हिम्मत करणाऱ्याला लोकोत्तर मुलांमध्ये गणले जातात जात असे.

पण ते काही असो, बाकी सारे गणित विसरले तरी पाढे मात्र आयुष्यभर साथ देतात! ‘आठी साती छप्पन’, ‘बार चोक अठ्ठेचाळ’, ‘पाचा पाचा पंचवीस’ ह्या संथा एखाद्या गाण्याच्या लयीसारख्या मनात कोरल्या गेल्या आहेत. ‘भीमरूपी’ नंतर ‘महारुद्रा’ यावं किंवा ‘सुखकर्ता’ नंतर ‘दुःखहर्ता’ यावं इतक्या सहजतेने ‘चौदा सक’ नंतर ‘चौऱ्यांशी’ येई. मराठी शिकलेल्या एखाद्या मोठ्या कंपनीच्या चेअरमनच्या तोंडीही ‘अरे, सतरा लाखाला एक मशीन म्हणजे पाच मशीनचे – सतरा पाचा पंच्याऐंशी – म्हणजे एटी फाईव्ह लॅक्स होतील, ’ असा पाढा ऐकू आल्यास आश्चर्य वाटणार नाही.

आजकाल इंग्लिश पाढे म्हणतात, पण ‘फोर सिक्स जा ट्वेंटी फोर’ मध्ये ‘चार सक चोवीस’ची सहजता नाही. बाकी जाऊ द्या, पण कमीतकमी पाढे तरी मातृभाषेतच हवेत हे आमचं प्रामाणिक मत आहे. अहो, ते आकड्यांची श्लोक आहेत हो! त्यांना तरी इंग्रजीपासून सोडा ना! पूर्वीच्याही पूर्वी पाढे ‘तीस’पर्यंत थांबत नसत. पुढे दिडकी – अडीचकी – औटकी असे. हे म्हणणे डोक्यापेक्षा जिभेसाठी त्रासदायक होते. ‘बे ते दहा’ – छान पायवाट, ‘दहा ते वीस’ – दोनचार खड्डे वाला साधा रस्ता, ‘वीस ते तीस’ – प्रचंड खडबडीत रस्ता आणि दिडकीबिडकी म्हणजे केवळ दगडं अंथरलेला रस्ता, असा तो प्रवास असे.

जर कोणाला स्वतःचं बालपण आठवायचं असेल तर बाकी काही न करता बेशक पाढे म्हणा – बे एक बे, बे दुने चार, बे त्रिक सहा… क्षणात पोहोचता की नाही ही बघा बालपणीच्या रम्य दुनियेत!

या लेखावरील प्रतिक्रिया – – – 

जुन्या आठवणींना उजाळा देणारा फार सुंदर लेख ! एका लयीत, एका सुरात, एका तालात एखादं समूहगीत म्हटलं जावं, तसंच पाढ्यांचं सुरेल गायन होतं असे. सवयीने, सरावानं, एकुणव्वदासे, त्रियोत्रिदोन, चवरोदरसे, बावनिदोन अशा अवघड शब्दांच्या सुद्धा नेमक्या संख्या कळत असत ! ती पाढ्यांची भाषा होती. तसे उच्चार करायला पण मजा वाटत असे. आताच्या काळांत आकलन, सुलभीकरणासाठी पाढ्यांतल्या संख्याही सरळसोट उच्चारल्या जातात, असं ऐकिवात आहे – नक्की माहित नाही. १ ते ३० पर्यंतचे पाढे आलेच पाहिजेत आणि रोज म्हटलेच पाहीजेत असा दंडकच होता. पुढे पुढे गणित, बीजगणित, भूमिती, क्ष+य, प्रमेय, साधन, सिद्धी, सिद्धता, रायडर्स, सूत्रे, गृहितके असे अनेक विषय विनाकारणच शिकलो असंच म्हणायला पाहिजे, कारण पुढच्या आयुष्यांत त्यांचं नांवही घेण्याची कधी वेळ आली नाही !… पण पाढे हा अपवाद !! ते पाठ असल्याचा फायदा पदोपदी अनुभवाला येतो. आजही फावल्या वेळात आठवतील त्या पाढ्यांचं गुंजन केलं, तर वेळ कसा जातो ते कळतंच नाही !

 

लेखक : श्री सुनील भातंब्रेकर 

लेख प्रस्तुती व प्रतिक्रिया : श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘पुणे… खूप खूप पूर्वीचे…’ लेखक : श्री दिगंबर देशपांडे – संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘पुणे… खूप खूप पूर्वीचे…’ लेखक : श्री दिगंबर देशपांडे – संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर

पेशवाईच्या काळात पुणे हे ओढे, नाले, गर्द झाडी, अरूंद रस्ते, गल्ली-बोळ, बखळी, असंख्य मोठ्या बागा, मोकळी सपाट मैदाने यांनी वेढलेले होते. सदाशिव पेठ हे एक खेडे होते. त्याचे नाव “मौजे नायगांव” असे होते. हा भाग “कारकोळपुरा” म्हणुन ओळखला जात असे. अनाथ विद्यार्थी गृह, नृसिंह मंदिर, खुन्या मुरलीधर हा परिसर कारकोळपुऱ्यात येतो. चिमाजीअप्पांचे पुत्र “सदाशिवरावभाऊ” यांच्या स्मरणार्थ माधवराव पेशव्यांनी या पेठेचे नाव सदाशिव पेठ असे ठेवले.

त्या वेळी पुण्यात मोठमोठे वाडे होते. बहुतेक वाड्यांतुन एखादे झाड, विहीर / आड असे. तांबड्या जोगेश्वरीचे मंदिर हे पुण्याच्या वेशीवर होते. तांबडी जोगेश्वरी, हुजुरपागा, तुळशीबाग, बेलबाग या समोरून एक ओढा वाहत होता. पुण्यात हिराबाग, सारसबाग, मोतीबाग, माणिकबाग, रमणबाग, कात्रज बाग, नातुबाग, विश्रामबाग, बेलबाग, तुळशीबाग या सारख्या मोठ्या आणि विस्तीर्ण बागांचे “साम्राज्य” होते. फुले मंडईजवळ खाजगीवाल्यांची चकले बाग होती. बहुतेक ठिकाणी पेरू आणि बोरांची झाडे होती. भवानी पेठेत बोरांच्या झाडांची दाटी असल्याने या भागाला बोरवन असे म्हणत. पूर्वी पुण्याच्या मध्यवर्ती भागात वड, पिंपळ, चिंच ही झाडे विपुल प्रमाणात होती.

सध्या पर्वतीच्या पायथ्याशी जो कॅनॉल वाहतो आहे, त्याच्या दोन्ही तीरांवर गर्द झाडी होती. तसेच द्राक्षांचे मळेही सगळीकडे होते. आंबा, केळी ही झाडे वाड्यातून असत.

तुळशीबागेत रामाच्या दर्शनासाठी जाण्यासाठी हिरवळीतुन पायवाट काढली होती. प्रभात रस्ता, डेक्कन जिमखाना या भागांत तर इमारती नव्हत्या. तेथे गवताच्या उंच गंजी होत्या. गायी म्हशींचे गोठे जागोजागी होते. सुरुवातीला शनिवारवाड्यासमोरील पटांगणात भाज्यांचा बाजार भरत असे. नंतरच्या काळात तेथे प्रवासी मोटार तळ झाला. चतु:श्रुंगीच्या मंदिर परिसरात घनदाट झाडी होती. विश्रामबागेच्या जागी हरिपंत फडक्यांची बाग, शनिपारापलीकडे नारोपंत चक्रदेवांची बाग, शिवाजी मंदिराच्या जागी सावकार गद्रे यांची बाग, पुणे विद्यार्थी गृहाच्या जागी सरदार रास्त्यांची बाग, त्याच्या अलीकडे नगरकरांची बाग अशी बागांची रेलचेल होती.

साधारण इ. स. १७००च्या आसपास पुण्याच्या आजुबाजूला मलकापुर, मुर्तजाबाद, शहापुर, शास्तापुर अशा छोट्या पेठा वसलेल्या होत्या. पुढे बाजीराव पेशव्यांनी मुर्तजाबादचे नाव बदलुन “शनिवार पेठ” असे ठेवले. शनिवार पेठेतल्या वीराच्या मारुतीच्या पुढे रस्ता नव्हता. इ. स. १७५३ मध्ये तळ्यातल्या गणपतीचे तळे नानासाहेब पेशव्यांनी मुद्दाम खणुन घेतले. या तळ्यातील पाण्यामुळे आजुबाजूच्या विहिरींना पाणी आले.

(सध्याच्या) टिळक स्मारक मंदिराच्या जागी पूर्वी पेशव्यांचा बंगला होता. त्याच्या आजुबाजुस मोठी बाग होती. या बागेला पाणी घालण्यासाठी विहीर खणली ती “खजिना विहीर” होय. नानासाहेब पेशव्यांनी १७५० साली हिराबाग बांधली. (येथे नाना साहेबांनी “मस्तानीला” नजर कैदेत ठेवले होते).

माती गणपतीच्या जागी सुद्धा घनदाट जंगल होते. मुठा नदीच्या किनारी असल्यामुळे तेथे मातीचे खूप ढिगारे होते. तेथे गुराखी, आपल्या गुरांना चारण्यासाठी आणत. हुजूरपागेच्या जागी घोड्यांची पागा / तबेले होते. नेहरू स्टेडियमच्या जागी तलाव होता. तो बुजवून तेथे स्टेडियम उभारले. (हल्लीच्या) लॉ कॉलेज रोडवरील फिल्म इन्स्टिट्यूटच्या जागी व्ही. शांतारामांचा “प्रभात स्टुडिओ” होता.

(“जुने पुणे आणि जुने वक्ते” या दिगंबर देशपांडे लिखित पुस्तकातुन साभार.)

लेखक : श्री दिगंबर देशपांडे

संग्राहक : अज्ञात 

प्रस्तती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “देव आणि स्टीफन हॉकिंग…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “देव आणि स्टीफन हॉकिंग…☆ श्री जगदीश काबरे ☆

स्टीफन हॉकिंग हा जगातला सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक म्हणून मान्यता पावलेला, आइन्स्टाइनच्या पंक्तीला बसू शकेल असा माणूस. त्यात अगदी विशीतच मोटर न्यूरॉन डिसीज झाल्यामुळे व्हीलचेअरला खिळण्याची पाळी त्याच्यावर आली. या रोगात एकेका अवयवावरचा मेंदूचा ताबा नष्ट होत जातो. शेवटची चाळीसेक वर्ष त्याच्या मानेखालच्या सर्व अवयवांवरचा ताबा गेलेल्या आणि बोलताही येत नसलेल्या अवस्थेत तो जगला. म्हणजे, चालत्याबोलत्या सामान्य मनुष्यापासून ते जवळपास निव्वळ विचार करणारा मेंदू अशा शारीर ते बौद्धिक अवस्थेपर्यंत त्याचा प्रवास झाला.

अशा स्थित्यंतरातही त्याने देवाची करुणा न भाकता आपल्या वैचारिक वैभवाने विश्वरचनाशास्त्रातली, कृष्णविवरांची, काल-अवकाशाची कोडी सोडवली. त्याच्या अनेक नव्या उत्तरांनी नवीनच प्रश्नांची दालनं उघडली.

हॉकिंग हा स्वत: एक विश्वरचनाशास्त्रज्ञ (कॉस्मोलॉजिस्ट) होता. म्हणजे विश्वाची उत्पत्ती कशी झाली, त्याची रचना काय आहे, या प्रश्नांचा अभ्यास करणारा. या अभ्यासासाठी प्रथम जुन्या ताऱ्यांचा आणि तारकासमूहांचा अभ्यास करावा लागतो. अवकाशात जितकं खोलवर, दूरवर पाहावं तितके जुने तारे दिसतात. असं का होतं? याचं कारण म्हणजे प्रकाशाला प्रवास करायला वेळ लागतो. आपल्या पृथ्वीत आणि सूर्यात जे अंतर आहे, ते कापायला सुमारे आठ मिनिटांचा वेळ लागतो. त्यामुळे आपल्याला सूर्य दिसतो तो आठ मिनिटांपूर्वीचा. सगळ्यात जवळचा तारा सुमारे साडेचार प्रकाशवर्ष दूर आहे. म्हणजे त्याचा आपल्यापर्यंत पोहोचलेला प्रकाशकिरण हा तिथून साडेचार वर्षांपूर्वी निघालेला असतो. अवकाशाची व्याप्ती प्रचंड असल्यामुळे अब्जावधी प्रकाशवर्ष दूरचे तारे दिसतात. त्यामुळे जेवढे दूरचे तेवढे जुने! 

१९२९ मध्ये या अभ्यासातून हबल नावाच्या शास्त्रज्ञाला हे लक्षात आलं, की सर्वच तारकासमूह एकमेकांपासून दूर जात आहेत. एखाद्या फुग्यावर ठिपके काढले आणि तो फुगवला तर सगळेच ठिपके आपल्या शेजारच्या ठिपक्यापासून दूर जाताना दिसतात, अगदी तसेच. जर तारकासमूह सतत दूर जात असतील, तर याचा अर्थ काही काळापूर्वी ते जवळजवळ होते आणि अजून पुरेसं मागे गेले, तर ते सगळेच एका बिंदूत एकवटलेले होते, असा निष्कर्ष निघतो. याचा अर्थ आपलं विश्व अनादी अनंत नसून एका क्षणी सुरू झालं! एका बिंदूपासून उगम होऊन गेल्या १३. ८ अब्ज वर्षांत इतकं महाकाय, प्रचंड झालं. याला ‘महास्फोटाचा सिद्धांत’ (बिग बँग थिअरी) म्हणतात. हे चित्र सामान्य माणसाचं डोकं चक्रावून टाकतं. कारण आपल्या डोळ्यांसमोर विश्वाची अनादी आणि अनंत अशी प्रतिमा ठसलेली असते.

विश्व निर्माण होण्याचा एक क्षण, एक बिंदू असेल तर साहजिकच प्रश्न पडतात- हे कोणी केलं? याआधी तिथे काय होतं? आपण इथे कसे आलो? यापुढे काय? हे विश्व असंच फुगत जाणार, की काही काळाने आकुंचन पावायला सुरुवात होत पुन्हा एका बिंदूत कोलमडणार? या प्रश्नांची हॉकिंगने उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे या विश्वाचा निर्माता देव आहे का? या प्रश्नाला इतरही उपप्रश्न चिकटलेले असतात. म्हणजे देवाची व्याख्या काय? देवाने हे विश्व निर्माण का केलं? देव मनुष्याच्या दैनंदिन जीवनात दखल घेतो का?… वगैरे वगैरे. या प्रश्नाचं उत्तर देताना हॉकिंग म्हणतो, ‘देव आहे की नाही, यावर मला काही भाष्य करायचं नाही. देव असलाच तर त्याने नक्की काय घडवलं, याबद्दल एक संदर्भचौकट मांडायची आहे. ’ यापुढे देवाबाबत हॉकिंगचं म्हणणं आहे की, ‘हे विश्व विशिष्ट नियमांनुसार चालतं. हे नियम अचल आहेत. ते कुठच्याही यंत्रणेमुळे बदलत नाहीत. कारण जे बदलू शकतात ते विज्ञानाचे मूलभूत नियम नसतात. त्यामुळे या अचल आणि सर्वासाठी सारख्या असलेल्या भौतिकीच्या नियमांनाच देव म्हणायचे असेल तर म्हणता येईल. ’ वर दिलेला ‘बिग बँग’चा संदर्भ देऊन हॉकिंग म्हणतो, ‘जेव्हा आपलं विश्व सुरू झालं तेव्हा अवकाश आणि काळही सुरू झाला. त्याआधी काही नव्हतंच. त्यामुळे शून्य काळाच्या आधी कोणीतरी निर्माता असणंही शक्य नाही. ’ हे स्पष्ट करण्यासाठी हॉकिंग उदाहरण देतो ते दक्षिण ध्रुवाचं. ‘तुम्ही दक्षिण ध्रुवावर पोहोचलात तर तिथून अजून दक्षिणेला काय असतं? ध्रुवाच्या व्याख्येपोटीच तिथून दिशा सुरू होतात. तिथून दक्षिणेला काही नसतं. तसंच ‘बिग बँगच्या क्षणाआधीचा क्षण’ असं काही नसतंच. ’ 

यापुढचा प्रश्न येतो तो म्हणजे शून्यातून विश्व कसं निर्माण झालं? हॉकिंग म्हणतो की, विश्व बनवण्यासाठी आपल्याला तीन गोष्टी लागतात. एक म्हणजे वस्तुमान- तारे आणि ग्रह बनवण्यासाठी; दुसरं म्हणजे ऊर्जा- सूर्यामध्ये ही भरपूर भरलेली हवी आणि तिसरं म्हणजे अवकाश- हे सगळे नांदण्यासाठी. आइन्स्टाइनने आपल्या सुप्रसिद्ध E = mc² समीकरणानुसार ऊर्जा आणि वस्तुमान एकच आहेत हे दाखवून दिलेलं आहे. याचा अर्थ, भरपूर ऊर्जा आणि अवकाश असेल तर आपल्याला नवीन सृष्टी बनवता येते. हे शून्यातून कसं निर्माण होतं? उत्तर सोपं आहे- नवीन अवकाश निर्माण करताना ऊर्जा मुक्त होते! अवकाशात धन आणि ऋण प्रकारच्या ऊर्जा असतात. (लक्षात ठेवा, सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा नसतात. ) त्यामुळे अवकाश आणि ऊर्जा दोन्ही मोठय़ा प्रमाणावर तयार झाले तरी त्यांची गोळाबेरीज शून्यच होते. एखादा मातीचा ढीग तयार करायचा असेल, तर नुसता ढीग तयार करण्यासाठी माती कुठून आणायची, हा प्रश्न उद्भवतो. मात्र, एक ढीग आणि एक तेवढाच खड्डा यासाठी मातीची गरज पडत नाही.

हे समजण्यासाठी ब्लॅकहोलच्या बाबतीतील माहिती आपण पाहूयात. समजा एक घड्याळ हे ब्लॅकहोलच्या जवळ जवळ नेत गेलो तर काय होईल? जसे जसे हे घड्याळ ब्लॅकहोलच्या जवळ जाईल तसे तसे त्याचा वेग हा कमी कमी होत जाईल आणि एक वेळ अशी येईल कि ज्या वेळी ते घड्याळ ब्लॅकहोल मध्ये पूर्ण आत गेलेले असेल आणि ते पूर्ण पणे थांबलेले असेल. ब्लॅकहोलमध्ये असं का घडतं, याचा ज्या वेळी अभ्यास करण्यात आला त्यावेळी शास्त्रज्ञाच्या लक्षांत आले की, ब्लॅकहोलमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती ही अनंत (Infinite) असते आणि त्यामुळे ती त्या घड्याळाला थांबवते, म्हणजेच वेळेला पण नष्ट करते. त्या ब्लॅकहोल मधून प्रकाशकिरणेही बाहेर जाऊ शकत नाहीत. कारण आत गेलेले प्रकाशकिरण हे ब्लॅकहोलच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे बाहेर निघू शकत नाहीत. म्हणजेच प्रकाशकिरणे ब्लॅकहोलमध्ये गेल्यावर नष्ट होतात. कारण ब्लॅकहोलमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती अनंत असते. अगदी असेच Big Bang च्या वेळेस घडले. त्यामुळे जे लोक मला अश्या प्रकारच्या प्रश्न विचारतात की, ‘खरंच का हे विश्व देवाने बनविले आहे?’ तेव्हा या प्रश्नाचे उत्तर देताना मी त्यांना सांगतो की, ‘ह्या प्रश्नामध्येच काहीही अर्थ नाही. हे विश्व देवाने बनविलेले नाही. कारण वेळ, काळ, वस्तुमान ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी निर्माण झाल्या त्याच क्षणी विश्वाची उप्पती झाली. म्हणूनच आपण म्हणतो की “We Got Everything from nothing” 

‘बिग बँग’च्या वेळी विश्व जितकं लहान होतं तितक्या लहान पातळीवर अभ्यास करायचा झाला, तर आइन्स्टाइनच्या सामान्य सापेक्षतावादाची सांगड पुंजभौतिकीशी घालावी लागते. शून्यमय अवकाशात एकवटणाऱ्या वस्तुमानाचा आणि तिथे घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करताना ‘सिंग्युलॅरिटी’ नावाची संकल्पना विचारात घ्यावी लागते. याचं कारण तिथली घनता अमर्याद वाढत जाते. अशा अनंताशी खेळत तिथली गणितं सोडवावी लागतात. हॉकिंगने कृष्णविवरांचा सखोल अभ्यास केला होता. कृष्णविवरांच्या केंद्रातही महाप्रचंड वस्तुमान एकवटलेलं असल्यामुळे तिथेही सिंग्युलॅरिटी तयार होते. म्हणूनच तो म्हणतो, विश्वाची उत्पत्ती- काळ, वस्तुमान, ऊर्जा आणि अवकाश या सगळ्यांचीच सुरुवात ‘बिग बँग’ने झाली. त्याचा निर्माता देव नक्कीच नाही… आहेत ते भौतिकशास्त्राचे अचल नियम. विश्वाच्या निर्मितीचे रहस्य समजून घेण्यासाठी ईश्वराची आवश्यकता नाही. महास्फोट हा केवळ भौतिक विज्ञानाच्या नियमांचा परिणाम आहे. सापेक्षतावाद आणि पुंजवाद यांच्या आधारे विश्वाची निर्मिती कशी शून्यातून होऊ शकते हे समजून घेता येते.

डार्विनच्या सिद्धांतामुळे ईश्वराला जीवशास्त्राच्या परिघाबाहेर करण्यात आले. ईश्वर नाही असे जरी कोणी सिद्ध करू शकले नाही तरी विज्ञानामुळे ईश्वर नामक संकल्पना आनावश्यक बनते हेही तितकेच खरे. म्हणूनच विज्ञान हाच ज्ञान मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे आणि शेवटी त्या मार्गावरूनच आपल्याला विश्वाच्या नियमांचे परिपूर्ण ज्ञान मिळू शकेल, असे स्टीफन हॉकिंग यांना ठामपणे वाटत होते.

©  जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares