मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १८ — मोक्षसंन्यासयोगः — (श्लोक ४१ ते ५०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १८ — मोक्षसंन्यासयोगः — (श्लोक ४१ ते ५०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

ब्राह्मणक्षत्रियविशां शूद्राणां च परन्तप । 

कर्माणि प्रविभक्तानि स्वभावप्रभवैर्गुणैः ॥ ४१ ॥ 

*

गुणांनुसार स्वाभाविक कर्मे मनुष्य आचरितो

कर्मानुसार ब्राह्मण वैश्य शूद्र क्षत्रिय तो ठरतो ॥४१॥

*

शमो दमस्तपः शौचं क्षान्तिरार्जवमेव च । 

ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम्‌ ॥ ४२ ॥ 

*

निग्रह अंतःकरणाचा इंद्रियांचे करुनी दमन

शुद्ध अंतर्बाह्य धर्मास्तव क्लेश करिती सहन

क्षमा परापराध्यांना आर्जव प्रति देहगात्रमन

अस्तिक ज्ञानी विज्ञानी आचरण ऐसे दैनंदिन

स्वभाव सोज्वळ अंतर्बाह्य नित्याचे हे आचरण

स्वाभाविक ही कर्मे जीवन हे ब्राह्मणाचे लक्षण ॥४२॥

*

शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यं युद्धे चाप्यपलायनम्‌ । 

दानमीश्वरभावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम्‌ ॥ ४३ ॥ 

*

शौर्य तेज धैर्य दक्षता समरातुनी ना पलायन

दानी ईश्वरभाव स्वाभाविक क्षत्रिय कर्मे जाण ॥४३॥

*

कृषिगौरक्ष्यवाणिज्यं वैश्यकर्म स्वभावजम्‌ । 

परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम्‌ ॥ ४४ ॥ 

*

गोपालन कृषि व्यापार स्वाभाविक वैश्यांची कर्मे

सेवा समस्त वर्णांची ही स्वाभाविक शूद्राची कर्मे ॥४४॥

*

स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः । 

स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु ॥ ४५ ॥ 

*

रत अपुल्या स्वाभाविक कर्मे परमसिद्धी मनुजा प्राप्त

तुला कथितो कर्माचे गुह्य होईल जयाने भगवत्प्राप्त ॥४५॥

*

यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततम्‌ । 

स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः ॥ ४६ ॥ 

*

सकल जिवोत्पत्ती होते विश्वव्यापि परमेशापासून

प्राप्ति तयाची मनुजा करता स्वाभाविक कर्मांचे अर्चन ॥४६॥

*

श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात्‌ । 

स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्‌ ॥ ४७ ॥ 

*

गुणहीन आचरण स्वधर्माचे श्रेष्ठ ना परधर्म गुणी आचरण

पापांचा ना धनी होत तो करिता नियत कर्माचे आचरण ॥४७॥

*

सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत्‌ । 

सर्वारम्भा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः ॥ ४८ ॥ 

*

सहज कर्म जरी सदोष असले त्याग तयाचा करू नये

धूम्रव्याप्त अग्नीसम दोषे युक्त कर्मांना त्या सोडू नको ॥४८॥

*

असक्तबुद्धिः सर्वत्र जितात्मा विगतस्पृहः । 

नैष्कर्म्यसिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति ॥ ४९ ॥ 

*

अनासक्त ज्याची बुद्धी नाही वासना काहीही

सन्यासे अधीन आत्मा नैष्कर्म्यसिद्धी प्राप्त होई ॥४९॥

*

सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे । 

समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा ॥ ५० ॥ 

*

ज्ञानयोगांतिमावस्था सिद्धीने ब्रह्मप्राप्ती

संक्षेपाने माझ्याकडुनी जाण सुभद्रापती ॥५०॥

 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘चो-ला’ ची चकमक… – लेखक : जयंत कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनवणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘चो-ला’ ची चकमक… – लेखक : जयंत कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनवणे ☆

सिक्कीममधे १९६५ सालातील सप्टेंबर महिन्यात ७/११ ग्रेनेडियर्स (गुरखा रायफल्स) च्या बटालियनला हुश्शार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. कारण होते चिनी सैन्याने आपल्या काही भूभागावर हक्क सांगून तेथील चौक्या हटवायचा निर्वाणीचा दिलेला इशारा.

७/११ ग्रे. आणि १० जम्मू-काश्मिर रायफल्सच्या एका बटालियनने ४७२० मीटर उंचीवर मोर्चा संभाळला होता. दोन वर्षे असेच चालले होते. किरकोळ कुरबूरींशिवाय काही घडले नाही.

अचानक ११ सप्टेंबर १९६७ रोजी नथूला खिंडीचे प्रकरण झाले. गंगटोकच्या रस्त्यांचे संरक्षण करण्यासाठी ७/११ ने रातोरात योग्य जागा बघून आपल्या चौक्या उभ्या केल्या. नथूलाच्या चकमकी थांबल्या आणि ७/११ च्या वाढदिवसानिमीत्त त्यांची जागा १० जे-के रायफल्सला देण्याचे आदेश आले.

२८ तारखेला आपली संदेशवहनाची सामूग्री, तोफा इ. घेऊन १०-जेके ने आपली जागा सोडली व आघाडीचा रस्ता पकडला. संदेशवहनाची यंत्रणा, चो खिंडीच्या पश्चिम-दक्षिण दिशेला दोन झोपड्या होत्या, त्या ठिकाणी उभी करायची योजना होती.

चो खिंडीत एक तोफ, तर दोन पलटणींनी १५१८१ नंबर ची चौकी गाठायची आणि तेथील ११-ग्रेनेडस् च्या सैनिकांना परत पाठवायचे, असे ठरले होते.

डी. कंपनीच्या दोन पलटणींनी १५४५० नंबरची चौकी, जी पश्चिमेला होती, तेथे संरक्षणाची जबाबदारी स्विकारली होती. उरलेल्या दोन पलटणींपैकी एक रायगाप येथे, तर एक ताम्झेच्या पिछाडीला अशी कामाची वाटणी झाली. या पलटणीबरोबर एक उखळी तोफांची तुकडी ठेवण्यात आली.

एक दिवस अगोदर १० जेकेच्या काही शिख जवानांची चिनी सैनिकांशी एका छोट्या जमिनीच्या तुकड्यावरून बाचाबाची झाली होती. किती मोठा तुकडा असेल हा ? फक्त अंदाजे ५ मीटर लांबीचा हा तुकडा होता.

सीमेवर वातावरण हे असे असते आणि ते तसेच ठेवावे लागते. ‘अरे’ ला ‘कारे’ विचारल्याशिवाय शत्रूही आपला आब राखत नाही. ते जगच वेगळे असते. आपल्याला येथे वाचून त्याची खरीखुरी कल्पना यायची नाही.

तर या तुकड्यावर एक खडक होता आणि त्यावरून त्यांची जुंपली होती. हा तुकडा ना त्यांच्या हद्दीत होता ना आपल्या. या तुकड्याच्या मध्यभागी एक पांढरी रेषा अस्पष्टशी दिसत होती.

या खडकाच्या दोन्ही बाजूला दोन्ही देशाचे तीन तीन सैनिक पहारा देत उभे रहात असत. या सैनिकांमध्ये साधारणत: दोन एक मीटर अंतर राखले जाते. कारण नुसता एकामेकांचा धक्का जरी चुकून लागला तरी १०-१५ जणांचे प्राण सहज जाऊ शकतात. विस्तवाशीच खेळ ! कारण बंदूकीच्या चापावर कायमच बोट आवळलेले असते.

या भांडणात जी वादावादी झाली त्यात एका चिनी सैनिकाला मारण्यात आले आणि त्याच्या कोटाचे बटण तुटले. हे झाल्यावर ते चिनी सैनिक परत गेले आणि दैनंदिन कार्यक्रम परत चालू झाला.

हे झाले पण याची खबरबात मेजर जोशी, जे या कंपनीचे प्रमुख होते, त्यांना फार उशिरा कळवण्यात आली. ३० सप्टेंबरला त्या दोन झोपड्यांच्या तळावर पोहोचल्यावर मेजर जोशींनी त्यांच्या दोन कंपन्यांनी आघाडीवर चौक्या प्रस्थापित केल्या आणि ते १५४५० कडे निघाले.

लेफ्टनंट राठोड यांना त्यांनी तशी कल्पना दिली की ते साधारणत: दुसर्‍या दिवशी, म्हणजे १ ऑक्टोबरला सकाळी साडेनऊला तेथे पोहोचतील.

मेजर जोशी मधे वाटेत लागणार्‍या राईगापला पोहोचले. या येथून १५५४० ची चौकी दिसत होती. वरून त्या दिशेला पहात असताना त्यांना दिसले की चिनी सैनिकांच्य़ा एका तुकडीने त्या चौकीला घेरण्याचे प्रयत्न चालवलेले आहेत आणि एक तुकडी डी कंपनी जेथे तैनात होती, त्या दिशेला जाताना दिसली.

मेजर जोशींनी लेफ्टनंट राठोड यांना त्वरित त्यांनी जे बघितले त्याची माहिती दिली. लेफ्टनंट राठोड यांनी लगेचच ‘त्या खडकावर चिनी अधिकारी हक्क सांगत आहेत व त्यांच्या बरोबर त्यांचा एक राजकीय अधिकारीही आला आहे’ ही माहीती दिली व काय झाले ते सांगितले.

नायब सुभेदार ग्यान बहादूर लिंबू हे चिनी सैनिकांशी वाद घालत होते आणि वादावादीच्या दरम्यान त्या खडकावर त्यांनी आपला उजवा पाय ठेवला. त्याबरोबर एका चिनी सैनिकाने त्यांच्या पायाला लाथ मारली आणि तो त्या खडकावरून बाजूला सारला ‘आमच्या हद्दीत पाय ठेवायचा नाही इ. इ…. ‘

सुभेदारांनी आपला तोच पाय परत त्याच ठिकाणी ठेवला आणि त्या सैनिकांना आव्हान दिले. वातावरण फारच तापत चालले होते.

हे होत असताना उरलेल्या चिनी सैनिकांनी पटापट त्यांच्या जागा घेतल्या आणि आपल्या बंदूका सरसावल्या. बहुदा हे प्रकरण चिघळवायचे हे त्यांचे अगोदरच ठरलेले असावे.

इकडे त्या चिनी सैनिकाने आपली संगीन सुभेदारांवर चालवली. त्याचा घाव बसला त्यांच्या हातावर.

पुढे काय झाले ते सिनेमातल्या सारखे होते. ज्या सैनिकांने हा हल्ला केला त्याचे दोन्ही हात कुकरीने धडावेगळे झालेले त्यालाच कळले नाही.

हे बघताच जागा घेतलेल्या चिनी सैनिकांनी बंदूका चालवायला सुरुवात केली. दोन्ही बाजूने गोळीबार चालू झाला आणि लान्स नाईक कृष्णा बहादूर यांनी आपले सैनिक घेऊन हल्ल्यासाठी एकत्रीत होणार्‍या चिन्यांवर हल्ला चढवला.

त्यांच्या मागेच “आयो गुरखाली” ही युद्ध गर्जना देत देवी प्रसाद हा जवान त्वेषाने चिन्यांवर तुटून पडला. पहिल्याच झटक्यात त्याने आपल्या कुकरीने पाच चिन्यांची डोकी उडवली.

सुभेदार लिंबू यांना छातीत लागलेल्या एका गोळीने वीरगती प्राप्त झाली. त्यांना, या दाखवलेल्या धैर्याबद्दल आणि पराक्रमाबद्दल मरणोत्तर वीरचक्र देण्यात आले.

लान्स नाईक कृष्ण बहादूर यांचे शव नंतर चिनी सैनिकांनी लष्करी इतमामाने परत केले. ते परत करायला जो चिनी अधिकारी आला होता त्याला इंग्रजी येत होते आणि त्याने कबूली दिली की “भारतीय सैनिक वाघांसारखे लढले.”

या घटनेचे महत्व १९६२ सालच्या युद्धात झालेल्या मानहानी नंतर प्रचंड होते. चिनी सैनिकांच्या मनातल्या भारतीय सैनिकांबद्दलच्या कल्पनांना जोरदार धक्का बसला.

इकडे नं १५४० वर लेफ्टनंट राठोड यांना गोळी लागून ते जखमी झाले.

हालचाल दिसताच चिनी सैनिकांनी आकाशात प्रकाश फेकणारे फ्लेअर्स उडवले तेव्हा त्यांना उमगले की त्यांच्या तिन्ही बाजूला गुरखा सैनिक आहेत आणि पुढून हल्ला होणार आहे. त्यांनी एकही गोळी न उडवता सन्मानाने माघार घेतली.

त्याच संध्याकाळी ज्या खडकावरून हे सगळे घडले त्या खडकावर मेजर जोशींनी परत आपला बूट ठेवला आणि त्यांना कोणीही हटकले नाही………….

वाचकहो, त्या निर्जन भागात त्या पाच मिटर जमिनीच्या तुकड्यावर असलेल्या त्या खडकाची किंमत काय, हे तहात जे हरतात, किंवा जे आपल्या ताब्यातला भुभाग शत्रूला सहज देऊन टाकतात, त्यांना कशी कळावी….?

या आणि नथू खिंडीत झालेल्या चकमकींमुळे चिनी सैन्याचा जो दबदबा उगिचच आपल्या सामान्य सैनिकांमधे पसरला होता तो कायमचा नष्ट झाला……… त्याचे उदा. आपण आत्ताच पाहिले.

 

लेखक : श्री जयंत कुलकर्णी

प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “उसळ-चपातीचे ऋण…!!”  – लेखक – अज्ञात ☆ श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “उसळ-चपातीचे ऋण…!!”  – लेखक – अज्ञात ☆ श्री सुनीत मुळे ☆

एकदा भीमसेन जोशी (अण्णा) गाण्याच्या मैफलीसाठी गुलबर्ग्यात गेले होते. ते आटपून अण्णांची गाडी परतीच्या प्रवासात होती. रात्रीची दोनची वेळ असेल. गाडी चालवता चालवता अण्णांनी मुख्य रस्ता सोडला आणि एका आडगावाच्या वाटेला लागले. साथीदारांना कळेचना की हे कुठे चाललेत.

तेवढ्यात अण्णा म्हणाले, “आमचे एक गुरुजी इथून जवळच राहतात. आता अनायसे या वाटेनं चाललोच आहोत तर त्यांना भेटू या.. !”

रात्री दोनची वेळ असल्यामुळे गावात सामसूम होती. थोड्या वेळाने एका अंधार्‍या खोपटापुढे अण्णांची गाडी उभी राहिली.. मंडळी गाडीतून उतरली.

अण्णांनी खोपटाचं दार ठोठावलं. एका वयस्कर बाईनं दार उघडलं. चिमणी मोठी केली आणि खोपटात प्रकाश पसरला. खाटेवर एक वयस्कर गृहस्थ पहुडला होता. त्याचं नाव रामण्णा.. ! 

अण्णा त्यांच्यापाशी गेले आणि त्यांना हात देऊन बसतं केलं.. अण्णा म्हणाले, ‘काय, कसं काय? ओळखलंत का? बर्‍याच दिवसांनी आलो, अलीकडे वेळच मिळत नाही..’ अण्णा कानडीतनं बोलत होते.

रामण्णाही ओळखीचं हसले.. थोड्या गप्पा आणि विचारपूस झाल्यावर अण्णांनी रामण्णाच्या पायांवर डोकं ठेऊन त्यांना नमस्कार केला आणि खिशातलं २०-२५ हजारांचं बिदागीचं पाकिट त्यांच्या हातात दिलं.. आणि त्यांचा निरोप घेतला..

साथीदार मंडळींना हा प्रकार काय आहे, हेच कळेना. तेव्हा अण्णांनीच खुलासा केला –

“इथून जवळच्याच एका रेल्वे स्थानकात (होटगीच्या आसपास) एके काळी मी बेवारशी राहायचो. सायडिंगला जे डबे लागत त्यातच झोपायचो. तिथेच रेल्वेच्या थंडगार पाण्याने आंघोळ उरकायचो. खिशात दमडा नव्हता. गाणं शिकण्यासाठी घरातून पळालो होतो. कानडीशिवाय दुसरी कोणतीही भाषा येत नव्हती. भिकारी अवस्थाच होती.

स्टेशनच्या बाहेरच तेव्हा हा रामण्णा त्याची हातगाडी लावत असे. मुगाची पातळ उसळ आणि चपात्या तो विकायचा. मस्त वास यायचा त्याच्या गाडीभोवती. मी तिथेच घुटमळायचा.. आमची ओळख झाली. गदगच्या जोशी मास्तरांचा मुलगा. गाणं शिकायचं आहे. इतपत जुजबी ओळख मी त्याला दिली”.

“उसळ-चपाती पाहिजे काय?”, असं तो मला विचारायचा. माझ्या खिशात दमडा नव्हता.

रामण्णा म्हणायचा, “तुला गाणं येतं ना? मग मला म्हणून दाखव. तरच मी तुला खायला देईन. फुकट नाही देणार.. !”

“घरी माझी आई जी काही कानडी भजनं आणि अभंग गायची, तेवढीच मला गाता येत होती. रामण्णाला दोन भजनं म्हणून दाखवली की तो मला पोटभर खायला द्यायचा..!”

“जो पर्यंत त्या स्टेशनात मुक्काम ठोकून होतो, तोपर्यंत मला रामण्णा खायला द्यायचा. पण फुकट कधीही नाही.

रामण्णा म्हणायचा, “तुला गाणं येतं ना? मग कशाला उगाच चिंता करतोस पोटाची ?”

रामण्णाचा निरोप घेऊन गाडी पुन्हा परतीच्या वाटेवर भरधाव वेगाने निघाली होती.. साथीदार मंडळी गप्प होती.. गाडीमध्ये शांतता होती. धीरगंभीर चेहर्‍याचे स्वरभास्कर गाडी चालवत होते..

रामण्णाच्या खोपटात भविष्यातला भारतरत्न येऊन मुगाची उसळ आणि चपातीच्या खाल्ल्या अन्नाला नमस्कार करून गेला होता.

हात आभाळाला टेकले तरी पाय जमिनीवर असलेला माणूस…..

स्वरभास्कर “

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य  ☆ — वाऱ्याचे शहर — शिकागो… ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆

सुश्री प्रज्ञा मिरासदार

? इंद्रधनुष्य ?

☆ — वाऱ्याचे शहर — शिकागो… ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार

सहा वेळा अमेरिकेत जाऊन मी बरीच शहरे पाहिली. तशी या वर्षांत देखील पाहिली. संपूर्ण कॅलिफोर्निया पाहिला. पण मनात भरले ते फक्त शिकागो शहर !! विंडी सिटी म्हणजे वाऱ्याचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेले हे शहर मिशिगन राज्यात मिशिगन लेक या समुद्रासारख्या मोठ्या सरोवराकाठी वसले आहे. खूप वर्षांपासून मला ते सुंदर शहर पहायचे होते. यावर्षी तो योग आला.

हे शहर पाहण्याचे मुख्य कारण केवळ स्वामी विवेकानंद हे होय. शिकागोमध्ये झालेली सर्व धर्म परिषद, फक्त गाजली ती स्वामीजींनी केलेल्या भाषणामुळेच !!!! प्रत्येक भारतीयाला या गोष्टीचा प्रचंड अभिमानच आहे.

The Art Institute of Chicago या नावाने प्रसिद्ध असलेल्या बिल्डिंगमध्ये स्वामीजींनी सर्व धर्म परिषदेत जे व्याख्यान दिले, ते जगप्रसिद्ध आहे. जगभरात खूप सर्वधर्म परिषद झालेल्या आहेत. पण ही सर्वधर्म परिषद आजतागायत सर्वांच्या स्मरणात आहे– ते फक्त स्वामी विवेकानंद यांच्यामुळेच!!!!

या परिषदेस हिंदू धर्माच्या एकाही प्रतिनिधीला निमंत्रण नव्हते. या आधीच्या कुठल्याही सर्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचा एकही प्रतिनिधी नसे. पण स्वामीजी या परिषदेसाठी भारतातून कसेबसे शिकागोला पोहोचले. खूप प्रयत्न करून, असंख्य लोकांना भेटून शेवटी त्यांनी या सर्व धर्म परिषदेत प्रवेश मिळविला. आर्थिक मदत मिळविली आणि बोटीत बसून दोन महिन्यांनी ते शिकागोत पोहोचले. अर्धपोटी व प्रसंगी उपाशी राहून त्यांनी दिवस काढले.

सर्वात शेवटी पाच मिनिटे भाषण करण्याची त्यांना परवानगी कशीबशी मिळाली. त्यांनी आपला धर्मग्रंथ म्हणून श्रीमद् भगवद्गीता नेलेली होती. तीही आयोजकांनी सर्व धर्मग्रंथांच्या खाली ठेवली. सर्वांची व्याख्याने झाल्यावर स्वामीजी बोलायला उभे राहिले. इतर सर्वजण सुटा बुटात होते. एकटे स्वामीजी भगव्या वस्त्रात होते.

त्यांनी सुरुवातीलाच शब्द उच्चारले “माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका” !!!!!

आणि जो टाळ्यांचा कडकडाट झाला, तो अडीच मिनिटे त्या भल्या मोठ्या सभागृहात निनादत होता. पुढे पाच मिनिटांचे भाषण दीड तास लांबले. पूर्ण सभागृह दीड तास मंत्रमुग्ध झाले होते. स्वामीजींनी इतिहास रचला होता. त्यात त्यांनी हिंदू धर्माविषयी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. आणि हिंदू धर्माविषयी इतरांच्या मनातील गैरसमज दूर केले. जगात हिंदू धर्माला मानाचे स्थान स्वामीजींनी मिळवून दिले. शेवटी त्यांनी सांगितले की, “हा माझा धर्मग्रंथ– सर्व धर्मग्रंथांच्या खाली ठेवला आहे. याचे कारणच असे आहे की, जगातील सर्व धर्मांचे व धर्मग्रंथांचे तत्वज्ञान याचे मूळच या भगवद्गीते मध्ये आहे. “

याच कारणाने ही सर्व धर्म परिषद गाजली. ती जिथे झाली ती इमारत आम्ही पाहिली. तिथे एका रूम मध्ये स्वामीजींविषयी, त्या परिषदेविषयी सर्व पुस्तके आहेत. स्वामीजींची छोटी मूर्ती तिथे ठेवलेली आहे. बाहेर हमरस्ता जो आहे, त्यावर “स्वामी विवेकानंद पथ” अशी इंग्रजीतली ठळक निशाणी आहे. ती पाहून अभिमानाने ऊर भरून आला.

शिकागो जवळच्याच नेपरविले या गावाकडे जाताना वाटेवरच स्वामी विवेकानंदांच्या स्मृती जपणारा “विवेकानंद वेदांत सोसायटी” नावाचा आश्रम आहे. आजूबाजूस संपूर्ण जंगल भोवती असून, मध्ये हा आश्रम होता. आश्रमात पोहोचेपर्यंत रस्ता चांगला असूनही, कुठेही माणूसच काय, पण गाडीही दिसत नव्हती.

आम्ही बाहेर गाडी पार्क केली आणि बंद दार उघडून आत गेलो. तिथे मात्र दोघे तिघेजण होते. त्यांनी आम्हाला तेथील मोठी लायब्ररी, स्वयंपाक घर डायनिंग हॉल सगळं दाखवलं.

लिफ्टने वरच्या मजल्यावर गेलो. तिथे एक ध्यानमंदिर आहे. ते एक मोठे सभागृह आहे. 100 जण बसतील एवढ्या खुर्च्या तिथे आहेत. एखाद्या देवघरात बसल्यानंतर शांत वाटावे तसे इथे वाटते. देवघरासारख्या या ध्यानमंदिरात आम्ही काही वेळ शांत बसलो. तिथे — विवेकानंद सर्व धर्मामधील काहीतरी चांगली तत्त्वज्ञाने आहेत– असे मानत होते. त्यामुळे अनेक धर्मांची प्रतीके तिथे लावलेली आहेत.

बाहेरच्या हॉलमध्ये स्वामी विवेकानंदांचे पूर्ण चरित्र, काही चित्रे, फोटो आणि माहिती या स्वरूपात भिंतीवर लावलेले आहे. त्यामध्ये स्वामीजी अमेरिकेत कसे आले, त्या सर्वधर्म परिषदेत भाषण देण्यासाठी ते कुणाकुणाला भेटले, कोणी त्यांना मदत केली तर कोणी झिडकारून लावले. शेवटी कशीबशी परवानगी स्वामींना मिळाली. ही सर्व माहिती व फोटो आम्ही वाचले, आम्ही पाहिले. तिथेच आम्हाला स्वामीजींच्या विषयी खूप माहिती मिळाली आणि अभिमान वाटला.

अजून एक The Hindu Temple of Greater Chicago या नावाने प्रसिद्ध असलेले मंदिर आहे. इथे अनेक देवतांचे छोटे छोटे गाभारे आहेत. अमेरिकेत जी जी हिंदू मंदिरे पाहिली तिथे असेच स्वरूप दिसते. या ग्रेटर शिकागो मंदिरात मुख्य गाभाऱ्यात श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्ती आहेत. हिंदू धर्म प्रसाराचे हे एक मोठे केंद्र आहे. खूपच मोठा विस्तार आहे या मंदिराचा!!! 

मंदिर जरा चढावर आहे. येण्याच्या वाटेवर खूप सुंदर परिसर आहे. एके ठिकाणी उजव्या हाताला एक मोठी व रेखीव सुंदर मेघडंबरी आहे. त्यात स्वामी विवेकानंदांचा पूर्णाकृती पुतळा आहे. तो पाहून खूप आनंद आणि समाधान झाले.

परक्या देशातही आपल्या सनातन धर्माची ध्वजा स्वामीजींनी आजही फडकवत ठेवली आहे. आणि त्या देशाने या स्मृती खूप चांगल्या रीतीने जपल्या आहेत. याचा आम्हास नितांत गर्व आहे.

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “एक बातमी आणि मी…”   ☆ श्री सुनील देशपांडे ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ “एक बातमी आणि मी…”   ☆ श्री सुनील देशपांडे

गुरुवार दिनांक नऊ जानेवारी २०२५ रोजी इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था, यांनी एक अभूतपूर्व यशस्वी प्रयोग घडवून आणला. …. अंतराळात दोन उपग्रह एकमेकांना जोडण्याचा आणि पुन्हा एकमेकांपासून विभक्त करण्याचा हा तो प्रयोग म्हणजे ‘स्पॅडेक्स’.

अशा तऱ्हेने अंतराळात उपग्रह एकमेकांना जोडणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. त्याचप्रमाणे अंतराळामध्ये चवळीचे बी रूजवून त्यांना मोड आणि पाने फुटल्याचा सुद्धा एक यशस्वी प्रयोग याआधी संस्थेने घडवून आणला आहे.

खरं म्हणजे इस्रो या संस्थेची सुरुवातीपासून आतापर्यंतची यशस्वी घोडदौड हा सर्व माध्यमांचा सर्वात जास्त आकर्षणाचा विषय असला पाहिजे. एखादी कादंबरी अथवा सिनेमाची कथा किंवा एखादी फॅन्टसी म्हणजेच अद्भुतकथा म्हणून सुद्धा ती खूप आकर्षक आहे. असे असताना एवढी महत्त्वाची मोठी बातमी लोकांना आकर्षक आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा एखादा कार्यक्रम म्हणजे एखाद्या अद्भुत कथेच्या कथाकथनाचा कार्यक्रम होऊ शकेल.

देशात बनलेला पहिला उपग्रह आर्यभट्ट, देशामध्ये बनलेले पहिले रॉकेट पीएसएलव्ही, मंगळयान, चांद्रयान आणि आत्ताचा हा स्पॅडेक्स हे प्रकल्प म्हणजे आपल्या आगामी चांद्र मोहिमेची यशस्वी पूर्वतयारीही नक्कीच म्हणता येईल. तसेच हे सर्व प्रयोग म्हणजे भारताकडे आता अंतराळातील प्रयोगशाळा उभारण्याची संपूर्ण क्षमता आली आहे याची खातरजमा आहे.

एच जी वेल्सच्या कल्पनेपेक्षाही सुरस अशा या कथा. कथा कसल्या? प्रत्यक्ष घटनाच. आपल्या देशातील तरुणांना केवढी मोठी प्रेरणा देऊ शकतील याची कुणाला जाणीव का होत नाही? 

दुसरा एक विचार मनात येतो आपल्या देशात सर्व सरकारी यंत्रणा अनेक वेळा अनेक अनैतिक चक्रात सापडलेल्या, प्रचंड नुकसानीत सापडलेल्या किंवा बंद पडलेल्या दिसून येतात. पण ही संस्था अशी नासली नाही, दुराचाराने ग्रासली नाही. हे सुद्धा आपल्या शास्त्रज्ञांचे फार मोठे यश म्हणता येणार नाही काय?

खरं म्हणजे माझ्या दृष्टीने गुरुवारची स्पॅडेक्स संबंधीची बातमी सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी. निदान भारतीय माध्यमांनी तरी या बातमीची मोठ्या प्रमाणावर दखल घ्यायला हवी होती. माझ्या दृष्टीने सगळ्या वर्तमानपत्रांची मथळ्याची बातमी (हेड लाईन) ही असायला हवी होती. सगळ्या वाहिन्यांवर दिवसभर ही बातमी प्रामुख्याने झळकायला हवी होती. त्यावर सतत चर्चा किंवा चर्चासत्रे आणि व्याख्याने यांचे आयोजन केले जायला हवे होते. ज्या काही बातम्या आपल्या सर्व वाहिन्यांवर झळकत आहेत त्यापेक्षा कितीतरी महत्त्वाची आणि अभिमानाची ही बातमी सर्वांच्या दृष्टीनेच असायला हवी होती. वृत्तपत्रांनी कुठेतरी कोपऱ्यात किंवा ई-आवृत्तीमध्ये चार ओळीत या बातमीची वासलात लावली. मराठी वाहिन्यांवर तर मला कुठेच ही बातमी आढळली नाही. अर्थात कुणीतरी कुठेतरी एक दोन वाक्यात ती गुंडाळली असण्याची शक्यता आहे. पण ती दिवसभर सतत दाखवण्यासारखी महत्त्वाची बातमी नक्कीच होती. त्या प्रयोगाचे काय झाले हे जाणून घ्यायला मी इच्छुक होतो. म्हणून अनेक वाहिन्यांवर फिरलो. परंतु गुरुवारी काही मला ती बातमी समजू शकली नाही. शुक्रवारी व्हाट्सअप वर किंवा गुगल वर ही बातमी शोधून सापडली. अशी बातमी शोधावी लागते हे आपले आणि आपल्या देशाचे दुर्दैव आणि माध्यमांचा नाकर्तेपणा समजावा काय?

खरे म्हणजे सगळ्या मराठी वाहिन्यांनी त्यांचा वार्ताहर स्वतंत्रपणे बेंगलोरला पाठवून इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या मुलाखती घेणे, ही माहिती मिळवून प्रस्तुत करणे, अशा प्रकारे खूप काही करणे आवश्यक होते. आपल्या देशाच्या दृष्टीने आणि संपूर्ण जगाच्या दृष्टीने सुद्धा या बातम्यांना मोठे महत्त्व आहे हे आपल्या स्वकीयांना समजेल तो सुदिन.

आदरणीय पूर्व राष्ट्रपती श्री अब्दुल कलाम यांनी इस्रायलच्या भेटीतील त्यांची एक आठवण सांगितली होती. इस्रायलमध्ये ते गेले असताना त्यावेळी इस्राईलचे युद्ध चालू होते. परंतु जेव्हा त्यांनी सकाळी तेथील वर्तमानपत्र पाहिले, तेव्हा वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर मथळ्याच्या बातमीवर (हेडलाईन वर) त्या देशामध्ये एका शेतकऱ्याने शेतीचा एक यशस्वी प्रयोग करून दाखवला त्याबद्दलची माहिती व फोटो संपूर्ण पहिले पान त्या प्रयोगावर आधारले होते. युद्धाच्या बातम्या आतील पानांवर होत्या. कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे हे जेव्हा आपल्या माध्यमांनाही समजेल तो सुदिन.

सध्या आपण आपल्या देशाच्या भावी पिढ्यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून भविष्याकडे नजर लावून आशावाद जपायला हरकत असू नये असे वाटते. आपण आपल्या आयुष्यात या राष्ट्रासाठी फारसे काही करू शकलो नाही असे वाटणाऱ्या माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांनी जाता जाता निदान या आशेचा सुगंध वातावरणात पसरून जावे एवढी तरी इच्छा धरू या !

© श्री सुनील देशपांडे 

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “’नारी शक्ती दिवस…” ☆ सुश्री शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “नारी शक्ती दिवस…☆ सुश्री शोभा जोशी ☆

राणी मां गाईदन्ल्यू

“नारी शक्ती दिवस …”

हम इस देश की नारी है!

फूल नही चिंगारी है

असं गर्वाने सांगणार्‍या या पराक्रमी स्रियांचा सन्मान करण्यासाठी वनवासी कल्याण आश्रमातर्फे २६ जानेवारी हा दिवस ‘नारी शक्ती दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. आपला पराक्रम सिध्द करणार्‍या अनेक स्रिया आपल्या देशात होऊन गेल्या. अगदी देवी देवतांपासून अलिकडच्या स्रियांपर्यंत. अगदी जनजातीतील स्रिया सुध्दा याला अपवाद नाहीत.

२६ जानेवारी हा दिवस ‘ नारी शक्ती दिवस ‘ म्हणून का निवडला?जी महिला ब्रिटिशांविरूध्द लढा देताना ऐन तारूण्यात १४ वर्षं ब्रिटिशांच्या कैदेत राहिली, त्या राणी मां गाईदन्ल्यूंचा २६ जानेवारी हा जन्मदिवस.

पूर्वेकडील मणीपूर राज्यात, काला नागा पर्वतांची रांग आहे. तेथील लंकोवा गावामध्ये,रोंगमै जनजातीतील लोथोनाग व करोतलीन्ल्यू या दांपत्त्याच्या पोटी,२६ जानेवारी १९१५ ला गाईदन्ल्यूचा जन्म झाला. ७ बहिणी व १ भाऊ असा त्यांचा परिवार होता. गाईदन्ल्यूचा अर्थ चांगला मार्ग दाखविणारी. ‘ मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ‘ या म्हणीनुसार,गाईदन्ल्यू लहानपणापासूनच स्वतंत्र विचाराच्या,दृढ इच्छाशक्ती असलेल्या,प्रतिभासंपन्न आणि चिंतनशील होत्या. आपल्या संस्कृतीवर, धर्मावर होणारं ख्रिश्र्चनांचं आक्रमण त्या पाहात होत्या. म्हणून आपल्या संस्कृतीचं, धर्माचं इंग्रजांपासून संरक्षण करणं,रूढी परंपरा टिकवून ठेवणं,अंधश्रध्दा दूर करणं,तसंच ब्रिटिशांना आपल्या देशातून हाकलवून लावणं हे ध्येय त्यांनी वयाच्या १३ व्या वर्षांपासून उराशी बाळगलं होतं.

‘हेरका’ या धार्मिक आणि नंतर स्वतंत्रता आंदोलनाकडे झुकलेल्या आंदोलनाचा प्रणेता,गाईदन्ल्यूंचा चुलत भाऊ,हैपोऊ जादोनांगला ब्रिटिशांनी फासावर लटकावले आणि वयाच्या १६ व्या वर्षी या लढ्याचे नेतृत्व गाईदन्ल्यूंकडे आले.

इंग्रजांना टॅक्स न देण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले. साथीदारांच्या साथीने,गनिमी काव्याने इंग्रजांवर हल्ले केले. असे करून त्यांनी इंग्रजांच्या नाकात दम आणला. त्यांना पकडण्यासाठी आधी २००/- रू. आणि नंतर ५००/- रू. बक्षीस जाहीर केलं पण त्या इंग्रजांच्या हाती लागल्या नाहीत.

१६ फेब्रु. १९३२ रोजी आसाम रायफल्सच्या सैनिकांबरोबर त्यांची लढाई झाली. त्यावेळीही इंग्रजांना त्यांना पकडता आले नाही. पण पोलोमी गावी आऊट पोस्ट बनवत असताना,एका बेसावध क्षणी त्या पकडल्या गेल्या. त्यांनी १४ वर्षं तुरूंगवास भोगला.

१९३७ साली पं. नेहरूंनी शिलाॅंगच्या तुरूंगात त्यांची भेट घेतली. त्यांचा पराक्रम पाहून, ‘ आपण तर नागांची राणी आहात ‘या शब्दात त्यांचा गौरव केला. राणी माॅं गाईदन्ल्यूची तुरूंगातून सुटका करावी,ही नेहरूंची मागणी ब्रिटिशांनी धुडकावून लावली. स्वातंत्र्यानंतर त्यांची तुरूंगातून सुटका झाली.

सूर्याला तात्पुरते ग्रहण लागले म्हणून तो कायमचा निस्तेज होत नाही. तसेच तुरूंगातून सुटल्यावर राणी माॅं पुन्हा झळाळून उठल्या. त्यांनी स्वतःला समाजकार्याला वाहून घेतलं. १९८५ साली वनवासी कल्याण आश्रमाच्या भिलाई येथे झालेल्या पहिल्या महिला संमेलनास त्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. १७ फेब्रु. १९९३ रोजी त्यांना देवाज्ञा झाली. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ भारत सरकारने एक टपाल तिकिट काढले. त्यांचे देशासाठीचे योगदान पाहून त्यांना ताम्रपट देऊन गौरवण्यात आले होते.

जनजातीमध्ये इतरही अनेक स्रियांनी मुघलांविरूध्द आणि इंग्रजांविरूध्द लढताना परा क्रम गाजवला आहे. वेळप्रसंगी प्राणांचे बलिदान दिले आहे. उदा.

महाराणी दुर्गावती. – ५ आॅक्टोबर १५२४ ला गोंंडवनातील कालिंजर किल्ल्यात जन्मलेली दुर्गावती पुढे गढमंगला राज्याची राणी झाली. या कुशल प्रशासक,पराक्रमी, शूर वीर राणीने अकबराच्या सैन्याचा युध्दात दोनदा पराभव केला. तिसर्‍या वेळी हार समोर दिसत असताना,ती बादशहा अकबराला शरण गेली नाही. तिने स्वतःच्या छातीत खंजीर खुपसून मरण जवळ केले.

झलकारीबाई – 

‘दैवायत्त कुले जन्मं

मदायत्तं तु पौरूषम् ‘

माझा जन्म कुठल्या कुळात व्हावा हे हातात नसलं तरी जन्म कसा घालवावा हे आपल्याला ठरवता येतं. ही उक्ती खरी करून दाखवली ती झलकारीबाईंनी. बुंदेल खंडातील भोजला गावामध्ये जनजातीतील एका निर्धन कोळी कुटूंबातील,खांदोबा आणि धनिया या दाम्पत्यापोटी २३ नोव्हेंबर १८३० रोजी जन्मलेल्या झलकारीबाई पुढे राणी लक्ष्मीबाईंच्या ‘दुर्गा ‘ नावाच्या सेनेच्या महिला तुकडीच्या सेनापती झाल्या. तलवारबाजी,बंदुका, तोफा चालविण्यात त्या पटाईत होत्या. झाशीच्या किल्ल्यावर इंग्रजांनी केलेल्या हल्ल्याच्या वेळी,राणी लक्ष्मीबाईंच्या जीवाला धोका आहे हे झलकारीबाईंच्या लक्षात आले. त्यांनी राणींच्या दत्तक पुत्राला घेऊन,किल्ल्यातून बाहेर पडण्याचा सल्ला राणींना दिला.

झलकारीबाई आणि राणींच्या चेहर्‍यात खूप साम्य असल्याने त्या राणींच्या वेशात इंग्रज सैन्याला सामोर्‍या गेल्या आणि राणी लक्ष्मीबाईंचे प्राण वाचवले.

फुलो आणि झानो – संथाल परगण्यातील सिध्दो – कान्होंच्या या बहिणी कुर्‍हाडीने शत्रूला मारण्यात तरबेज होत्या. त्यांनी इंग्रज आणि जनतेच्या शोषणकर्त्या जमीनदारांविरूध्द सशस्र संघर्ष केला.

अंदमानची लीपा,मिझोरामची राणी रोपुईलियानी,अरूणाचलच्या सीमावर्ती भागातील नीरा आणि सेला,छत्तीसगड मधील दयावती कंवर, राजस्थानची कालीबाई,उत्तराखंडची गौरादेवी,गोंडवनाची राणी फुलकंवर इ. या निरनिराळ्या राज्यातील सर्व स्रियांनी इंग्रजांविरूध्द लढा दिला आहे. जनजातीतील अशा अजून कितीतरी स्रिया आहेत.

या अधुनिक काळातील महिलाच पराक्रमी होत्या असं नाही. तर वारसा अगदी आपल्या देवी देवतांपासून चालत आला आहे. महिषासूर मर्दिनी,काली माता,चंडिका अशा अनेक देवता ज्यांनी आपल्या शक्तीने आणि पराक्रमाने अनेक राक्षसांचा नाश केला.

इतिहासात डोकावले तर राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर,राणी ताराबाई,राणी चेन्नम्मा अशा कितीतरी स्रियांची नावं समोर येतील. या झाल्या युध्दभूमीवर पराक्रम गाजवणार्‍या स्रिया. पण बौध्दिक क्षेत्रातही स्रिया मागे नाहीत. पुराणातील गार्गी, मैत्रेयी,लोपामुद्रा इत्यादींनी आपल्या बुध्दीचातुर्याने मोठ्या मोठ्या विद्वान पंडितांना हरवले होते. विद्वत्तेच्या बाबतीत डाॅ. आनंदीबाई जोशी,डाॅ. रखमाबाई राऊत,पंडिता रमाबाई,सावित्रीबाई फुले इ. स्रियांनी आपली विद्वत्ता अशा काळात सिध्द केली की, ज्या काळात स्रियांना घराबाहेर पडण्याची देखील बंदी होती.

या स्रियांचा सन्मान करण्यासाठी आणि नवीन पिढीतील महिलांना प्रेरणा देण्यासाठी,पराक्रमी राणी गाईदन्ल्यूंचा २६ जानेवारी हा जन्मदिवस ‘नारी शक्ती दिवस ‘ म्हणून साजरा करण्यात येतो. 💐🙏

©  सुश्री शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १८ — मोक्षसंन्यासयोगः — (श्लोक ३१ ते ४०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १८ — मोक्षसंन्यासयोगः — (श्लोक ३१ ते ४०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

यया धर्ममधर्मं च कार्यं चाकार्यमेव च । 

अयथावत्प्रजानाति बुद्धिः सा पार्थ राजसी ॥ ३१ ॥ 

*
विवेक नाही धर्माधर्म कर्तव्य-अकर्तव्याचा 

त्या पुरुषाला जाणी धनंजया राजस बुद्धीचा ॥३१॥

*
अधर्मं धर्ममिति या मन्यसे तमसावृता । 

सर्वार्थान्विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी ॥ ३२ ॥ 

*
अधर्मास जी मती जाणते श्रेष्ठधर्म म्हणोनीया

सर्वार्थासी विपरित मानित तामसी बुद्धी धनंजया ॥३२॥

*

धृत्या यया धारयते मनःप्राणेन्द्रियक्रियाः । 

योगोनाव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्त्विकी ॥ ३३ ॥ 

*

ध्यानयोगे धारण करितो मनप्राणगात्रकर्मणा

अव्यभिचारिणी ती होय पार्था सात्विक धारणा ॥३३॥

*
यया तु धर्मकामार्थान्धृत्या धारयतेऽर्जुन । 

प्रसङ्गेन फलाकाङ्क्षी धृतिः सा पार्थ राजसी ॥ ३४ ॥ 

*
फलाशाऽसक्तीग्रस्त धर्मार्थकाम धारियतो

राजसी धारणाशक्ती पार्था तयास संबोधितो ॥३४॥

*
यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च । 

न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थ तामसी ॥ ३५ ॥ 

*
निद्रा भय दुःख शोक मद धारयितो दुष्टमती

धारणाशक्तीसी ऐश्या धनंजया तामसी म्हणती ॥३५॥

*
सुखं त्विदानीं त्रिविधं शृणु मे भरतर्षभ । 

अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तं च निगच्छति ॥ ३६ ॥

*
यत्तदग्रे विषमिव परिणामेऽमृतोपमम्‌ । 

तत्सुखं सात्त्विकं प्रोक्तमात्मबुद्धिप्रसादजम्‌ ॥ ३७ ॥ 

*
भरतकुलश्रेष्ठा तुजसी त्रिविध सुखांचे गुह्य सांगतो

ध्यान भजन सेवेसम परिपाठे दुःख विसरुनी रमतो

प्रारंभी गरळासम भासतो तरीही अमृतासम असतो

सुखदायी प्रसाद आत्मबुद्धीचा सात्त्विक खलु असतो ॥३६, ३७॥

*
विषयेन्द्रियसंयोगाद्यत्तदग्रेऽमृतोपमम्‌ । 

परिणामे विषमिव तत्सुखं राजसं स्मृतम्‌ ॥ ३८ ॥ 

*
सुखे विषयेंद्रियांचे भोगकाळी परमसुखदायी असती

विषसम परिणती तयाची सुख तया राजस म्हणती ॥३८॥

*
यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनमात्मनः । 

निद्रालस्यप्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतम्‌ ॥ ३९ ॥ 

*

भोगकाळी परिणामी मोहविती जी आत्म्याला

निद्राआळसप्रमाद उद्भव तामस सुख म्हणती त्याला ॥३९॥

*
न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु व पुनः । 

सत्त्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिः स्यात्त्रिभिर्गुणैः ॥ ४० ॥ 

*

इहलोकी अंतरिक्षात देवलोकी वा विश्वात 

सृष्टीज त्रिगुणमुक्त कोणी नाही चराचरात ॥४०॥

 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भेट… कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

☆ भेट… कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

किती प्रगल्भ व्याप्ती आहे ‘भेट’ या शब्दाची !

खरंच, खूपच अर्थपूर्ण.

 

कोण? कुणाला? कुठे? केव्हा?

कशाला? ‘भेटेल’

 

आणि

 

का? ‘भेटणार नाही’

 

ह्याला ‘प्रारब्ध’ म्हणावं लागेल.

 

‘भेट’ ह्या शब्द संकल्पनेविषयी थोडंसं काव्यात्मक विवेचन.

 

‘भेट’ कधी ‘थेट’ असते,

कधी ती ‘गळाभेट’ असते,

कधी ‘Meeting’ असते,

कधी नुसतंच ‘Greeting’ असते.

 

‘भेट’ कधी ‘वस्तू’ असते प्रेमाखातर दिलेली.

‘भेट’ कधी ‘देणगी’ असते कृतज्ञापूर्वक स्वीकारलेली.

 

‘भेट’ कधी ‘धमकी’ असते…

‘बाहेर भेट’ म्हणून दटावलेली.

‘भेट’ कधी ‘उपरोधक’ असते…

‘वर भेटू नका’ म्हणून सुनावलेली.

 

‘भेट’ थोरा-मोठ्यांची असते,

इतिहासाच्या पानात मिरवते.

‘भेट’ दोन बाल-मित्रांची असते…

फार वर्षांनी भेटल्यावर,

पिकल्या केसांचा अंदाज घेत चाचपलेली.

 

‘भेट’ कधी अवघडलेली,

‘झक’ मारल्यासारखी.

‘भेट’ कधी मनमोकळी,

मनसोक्त मैफिल रंगवलेली.

 

‘भेट’ कधी गुलदस्त्यातली,

कट-कारस्थान रचण्यासाठी.

‘भेट’ कधी जाहीरपणे,

खुलं आव्हान देण्यासाठी.

 

‘भेट’ कधी पहिली- वहिली

पुढल्याची ओढ वाढवणारी

‘भेट’ कधी अखेरची ठरते.

मनाला चुटपूट लावून जाते.

 

‘भेट’ कधी अपुरी भासते,

… बरंच काही राहून गेल्यासारखी.

‘भेट’ कधी कंटाळवाणी,

घड्याळाकडे पाहून ढकलल्यासारखी.

 

‘भेट’ कधी चुकून घडते,

… पण आयुष्यभर पुरून उरते.

‘भेट’ कधी ‘संधी’ असते,

निसटून पुढे निघून जाते.

 

‘भेट’ कोवळ्या प्रेमिकांची.

लाजरी-बुजरी नुसतीच नजरानजर.

‘भेट’ घटस्फोटितांचीही असते.

… हक्क सांगण्यासाठी मुलांवर.

 

‘भेट’ एखादी आठवणीतली असते.

मस्त ‘Nostalgic’ करते.

‘भेट’ नकोशी भूतकाळातली.

….. सर्रकन अंगावर काटा आणते.

 

‘भेट’…

विधिलिखीत… काळाशी न टाळता येण्याजोगी !

 

‘भेट’…

कधीतरी आपलीच आपल्याशी.

अंतरातल्या स्वत:शी.

आयुष्याच्या नाजुक वळणापाशी.

…… अचानक झालेली अणि न विसरणारी भेट.

… ‘पुन्हा भेटू*.

कवी  : अज्ञात 

प्रस्तुती :  श्री सुहास सोहोनी

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भोजन आणि संगीत… लेखक : डॉ. अनिल वैद्य ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ भोजन आणि संगीत… लेखक : डॉ. अनिल वैद्य ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

… एक अभ्यासपूर्ण लेख – 

🎼 🎤🎻🎹 🎷🥁

रविवारी पुणे ओपीडी मधे कोणत्या रुग्णाला सांगितले नक्की आठवत नाही.

काय सांगितले ते आठवत आहे.

स्वयंपाक करत असताना, भोजन करत असताना आणि भोजन झाल्यानंतर १ तास ‘मंद स्वरातील’ संगीत घरी लावत जा.

 

इथे आपल्याला म्युझिक, डीजे, मॅश अप नको आहे. भावगीत, भक्तीगीत, सुगम संगीत, शास्त्रीय संगीत, वाद्यांचा शांत आवाज पुरेसे आहे.

त्याने काय होईल ?? रुग्णाचा प्रश्न! 

दोन महिने न चुकता करा आणि मला तुम्हीच सांगा… माझे उत्तर! 

संगीत – स्वर यांचा आणि आपल्या शरीरातील दोष स्थितीचा ‘थेट’ संबंध आहे.. त्या विषयी….

शरीरातील दोषांची साम्यावस्था आणि शरीराचा बाहेरच्या घटनांना मिळणारा प्रतिसाद यात पंचज्ञानेंद्रिय पैकी कानाशी बराच जवळचा संबंध असतो.

प्रकाश आणि आवाज याचा वेग प्रचंड असतो.

कित्येक मैल दूर वीज पडली तर आपला जीव घाबरा होतो.

चार रस्ते सोडून कोठे करकचून ब्रेक कोणी मारला तर आपण काळजी करतो.

घरी कोणी मोठ्याने बोलले तर नाजूक मनाच्या लोकांना चक्कर येते… इत्यादी! 

पूर्वी जेव्हा लग्न हा संस्कार असायचा, इव्हेन्ट नसायचा तेव्हा बिस्मिल्ला साहेबांची सनई आपले स्वागत करायची.

आता योयो किंवा बादशाह, डीजे किंवा ढोल पथक आपले वेलकम करते.

संस्कारापेक्षा भपका जास्त.

शांती पेक्षा गोंगाट जास्त.

याने काय होते ? मूळ हेतुकडे दुर्लक्ष होऊन विनाकारण हृदयात धडधड वाढते.

पुढील वर्ग पहा – 

१. जेवण बनवत असताना फोनवर बोलणारे.

२. जेवण करत असताना फोन वर बोलणे – व्हिडीओ पाहणे – टीव्ही पाहणे – इमेल्स पाहणे इत्यादी.

३. जेवण करत असताना भांडणे / मोठ्याने बोलणे, समोर असलेल्या प्रदार्थाबद्दल वाईट बोलणे.

४. गप्पा मारत जेवणे.

५. जेवण झाल्यावर ऑफिस चे काम / घरकाम / बाहेर जाणे इत्यादी.

या पाच प्रकारात आपण कोठे ना कोठे बसत असतो. अगदी रोज.

चार घास खायला मर मर करायची आणि चार घास युद्धभूमीवर बसून खायचे..

डोकं शांत नाही. जेवणाकडे लक्ष नाही. जिभेवर नियंत्रण नाही. ही अनारोग्य निर्माण करणारी तिकडी! 

संगीत हे नादावर आधारलेले आहे.

अग्नी आणि वायू यांच्या योगाने उत्पन्न होणाऱ्या ध्वनीला ‘नाद ‘ म्हणतात.

आपल्या हृदयात २२ नाडी आहेत असं मानले जाते. या क्रियाशील नाड्यानी हृदय आणि शरीर याचे संचलन होते.

याच आधारावर संगीतात २२ श्रुती मानल्या आहेत. या एका पेक्षा एक वरच्या पट्टीत आहेत.

बावीस श्रुती मधून बारा स्वर.

हिंदुस्थानी संगीतातील सात मुख्य स्वरांपैकी षड्ज आणि पंचम हे स्वर अचल असतात. ऋषभ, गांधार, धैवत आणि निषाद हे स्वर शुद्ध आणि कोमल या दोन चल स्वरूपांत व्यक्त होतात, तर मध्यम हा स्वर शुद्ध आणि तीव्र असा स्पष्ट होतो. याप्रमाणे हिंदुस्थानी संगीतातील पायाभूत सप्तक पुढीलप्रमाणे :

– षड्ज (सा),

– कोमल ऋषभ (रे),

– शुद्ध ऋषभ (रे),

– कोमल गांधार (ग),

– शुद्ध गांधार (ग),

– शुद्ध मध्यम (म),

– तीव्र मध्यम (म),

– पंचम (प),

– कोमल धैवत (ध),

– शुद्ध धैवत (ध),

– कोमल निषाद (नी),

– शुद्ध निषाद (नी) 

– आणि षड्ज (सा).

यातील षड्ज म्हणजे सहा स्वरांना जन्म देणारा सूर्य.

श्रवणेंद्रिय मार्फत ऐकलेले जे ब्रह्मरंध्र पर्यंत पोहोचून त्या नादाचे विविध प्रकार होतात त्यांना श्रुती म्हणतात.

तीन सप्तक – 

१. मंद सप्तक – हृदयातून निघणारा आवाज 

२. मध्य सप्तक – कंठातून निघणारा आवाज 

३. तार सप्तक – नाभी पासून निघून ब्रह्म रंध्र पर्यंत जाणारा आवाज.

आपल्या दोषांची स्थिती दिवसभरात बदलत असते. सकाळी कफ वाढतो. दुपारी पित्त आणि रात्री वात वाढतो.

रागवर्गीकरणाची आणखी एक पद्धत म्हणजे समयाश्रित राग ही होय.

हिंदुस्थानी संगीतात परंपरेनुसार अमुक एक राग अमुक वेळेला प्रस्तुत करावा, असा संकेत आहे. याकरिता रागांचे तीन वर्ग मानले आहेत : रे, ध, शुद्ध असणारे राग रे, ध कोमल असणारे राग आणि ग, नी कोमल असणारे राग.

यात शुद्ध मध्यम व तीव्र मध्यम या स्वरांना समयानुसार मिळवून, पहाटे ४ ते ७ व दुपारी ४ ते ७ अशावेळी संधिप्रकाशसमयी सामान्यतः रे कोमल व ध शुद्ध घेणारे राग गाइले जातात.

सकाळी ७ ते १० व 

रात्री ७ ते १० असे दुसरे समयाचे विभाजन असून,

रात्री १० ते ४ व 

दुपारी १० ते ४ असे तिसरे विभाजन आहे. शरीरातील दोषांचे संतुलन करायची क्षमता या रागात, संगीतात आहे.. ! 

आपल्याला कायम उद्दीपित करणारे संगीत ऐकायची सवय झाली आहे.

बेशरम रंग असेल किंवा काटा लगा व्हाया बदनाम मुन्नी ते शीला ची जवानी.. स्पोटिफाय वर हेच ऐकणे सुरु असते.

मी संगीतातील तज्ज्ञ नाही. मी संगीत शिकलेलो नाही.

ठराविक आवाजाला शरीर प्रतिक्रिया देते हे सत्य आहे.

स्वयंपाक करत असताना कानावर भिगे होठ तेरे पडत असेल तर सात्विक मेनू पण तामसिक गुणांचा होतो.

जेवण करत असताना कानावर रडकी गाणी पडत असतील तर राजसिक वाढ होते.

आपण काय खातोय यापेक्षा आपण कोणत्या वातावरणात खातोय हे महत्वाचे असते! 

वर उल्लेख केलेले संगीत आपल्या वृत्ती स्थिर करतात.

आपण जे काम करत आहोत त्यात एकाग्र करण्यास मदत करतात.

आपण जे खाल्ले आहे ते पचवायला मदत करतात… !

क्राईम पेट्रोल बघत जेवण करणारे कालांतराने आक्रमक होतात असे माझे निरीक्षण आहे! 

कोणाला यावर विश्वास बसत नसेल तर दोन महिने हे करून बघावे.

मी स्वतः स्वयंपाक करत असताना, जेवताना, रुग्ण तपासणी करत असताना गीत रामायण, मनाचे श्लोक, क्लासिकल इत्यादी ऐकत असतो.

आपल्याला कोठे ‘कुंडी ना खडकाओ राजा सीधे अंदर आओ राजा’ असे स्टंट करायचे आहेत.

आजूबाजूचे वातावरण सात्विक असेल तरच खाल्लेले अन्न सात्विक गुणाचे होते.

नाहीतर फक्त सलाड चरून कायम शिंग मारायची खुमखुमी असलेले मेंढे आपल्या आजूबाजूला शेकड्याने आहेतच की..

🎼 🎤 🎼

लेखक : डॉ. अनिल वैद्य

 …. एक संगीत प्रेमी…

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ प्रसंगावधान… ☆ माहिती संकलन व प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

? इंद्रधनुष्य ?

☆ प्रसंगावधान… ☆ माहिती संकलन व प्रस्तुती – डाॅ.भारती माटे

आदिती प्रधान, पुण्यात राहणारी एक उच्चशिक्षित, सुंदर २३ वर्षीय तरूणी. आदिती एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत टेक्नॉलॉजी अॅनालिस्ट आहे. सध्या ती एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करत असल्याने घरी जायला बर्‍याचदा उशीर होतो. पण आज क्लायंट सोबतच्या व्हिडिओ कॉन्फरन्स मुळे रात्रीचे अकरा कसे वाजले तिला कळंलं देखील नाही.

आदितीने बॅग उचलली, ड्रॉवर उघडून मोबाइल बाहेर काढला. आईचे ५ मिसकॉल दिसत होते. फोन करून आईला तिने तासाभरांत घरी पोहचते असे सांगून मोबाइल वर कंपनीचे कॅब बुकिंग अॅप उघडले आणि कॅब बुक केली. ती बाहेर पडत असतानाच कॅब समोरून येताना दिसली. दार उघडून ती आत बसली. ड्राइवर शिवाय कॅबमधे कोणीही नव्हते. आज तिला फारच उशीर झाला होता. ड्रायव्हर सुद्धा ओळखीचा वाटत नव्हता. कंपनीतील महिला कॅबमधे एकटी असल्यास किंवा तिचा शेवटचा स्टॉप असल्यास सेक्युरीटी गार्ड बरोबर घेण्याची सुविधा होती पण आदिती सहसा गार्ड बरोबर घेण्याचे टाळत असे.

हिंजेवडी फेज वन वरून गाडी बाहेर पडली आणि मुंबई बेंगलोर रस्त्याला लागली. पाच दहा मिनिटं झाली असतील ड्रायव्हरने समोर ठेवलेला त्याचा मोबाईल उचलून स्विच अॉफ केला. तिने कारण विचारल्यावर “मोबाइल डिस्चार्ज होतो आहे आणि थोडय़ा वेळाने महत्त्वाचा कॉल करायचा आहे. म्हणून बंद केला. ” असे त्याने सांगितले. पण त्याच्या उत्तराने आदितीचे समाधान झाले नाही. कंपनीच्या कॅब बुकिंग अॅपला त्याचे लोकेशन ट्रॅक करता येऊ नाही म्हणून त्याने मोबाइल बंद केला हे तिच्या लक्षात आले.

तिच्या डोक्यात धोक्याची घंटा वाजू लागली. तेव्हढ्यात ड्रायव्हरने गाडीचा स्पीड वाढवला. आणखी थोड्या वेळात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका माणसाजवळ गाडी येऊन थांबली आणि तो माणूस ड्रायव्हर शेजारचे दार उघडून गाडीत येऊन बसला. पेहरावावरून आणि चेहर्‍यावरून तो माणूस काही सभ्य वाटत नव्हता. दोघांच्या हेतूची तिला पूर्ण कल्पना आली आणि तिची खात्री झाली कि ती फार मोठ्या संकटात सापडली आहे.

थंडीचे दिवस असूनही आदितीला घाम फुटला. घशाला कोरड पडली. मोठ्या प्रयत्नाने तिने स्वतःवर ताबा मिळवला आणि शांत डोक्याने विचार करण्याचा प्रयत्न करू लागली. अचानक तिला आठवले काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपवर आलेली एक पोस्ट वाचून तिने 112India अॅप डाउनलोड करून मोबाइलवर इन्स्टॉल करून घेतले होते आणि त्याला टेस्टही केले होते. थरथरत्या हाताने तिने पर्समधून मोबाइल बाहेर काढला. पिन टाकून सुरू करून होमस्क्रीन वरचे 112India अॅप ओपन केले आणि पोलिसांच्या मदतीसाठीचे बटन दाबले. आत्ताच्या परिस्थितीत या अॅपमुळे आपल्याला काही मदत मिळते की नाही या बाबतीत अादिती साशंक होती.

एव्हाना गाडीचा वेग कमी होऊन गाडी एका सुनसान रस्त्यावरून धावत होती. ड्रायव्हर शेजारी बसलेला माणूस मागे वळून घाणेरड्या नजरेने तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव करत होता. तिने पुन्हा एकदा 112India अॅपवरचे पोलिस आणि अदर्स हे दोन्ही बटन्स एकामागोमाग एक दाबले. दुसरी कुठलीही मदत मिळेपर्यंत तिला स्वतःच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करणे भाग होते. ड्रायव्हरजवळ बसलेल्या माणसाला ती मोबाइलवर कोणाची तरी मदत मिळवण्याचा प्रयत्न करते आहे, याचा संशय आला होता. त्याने मागच्या सीटवर झुकून तिचा मोबाइल काढून घेण्याचा प्रयत्न केला. आदितीने मोबाइल पटकन पर्समधे टाकला आणि चालत्या गाडीचे दार उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागली. पण गाडी आतून लॉक होती.

गाडी एका निर्मनुष्य जागी येऊन थांबली. ड्रायव्हर आणि त्याच्याजवळ बसलेला माणूस दोघेही दार उघडून मागे आले. दोघेही गाडीची मागची दोन्ही दारं उघडून तिला घेरून उभे राहिले. क्षणाचाही विलंब न करता अादिती उजव्या बाजूच्या दारातून ड्रायव्हरला ढकलून बाहेर पडली आणि रस्त्याच्या दिशेने धावत सुटली.

अॅपवरून पोलिसांना सूचना देऊनही दहा मिनिटे उलटली होती. ती जीवाच्या आकांताने पळत होती. त्याचबरोबर पोलिसव्हॅनच्या सायरनचा आवाज येतो का हे ऐकण्याचा प्रयत्न करत होती. दोघेही तिचा पाठलाग करत होते. दोन तीन मिनिटांतच त्यांनी तिला सहज गाठलं असतं.

तेवढ्यातच पोलिसांच्या गाडीच्या सायरनचा आवाज तिला एेकू आला. तिच्या जीवात जीव आला आणि ती अधिकच जोरात रस्त्याच्या दिशेने धावू लागली. थोड्याच वेळात पोलिस व्हॅन तिच्या दृष्टीस पडली. पाच पोलीस व्हॅनमधून उतरले. त्यात एक महिला पोलीस देखील होती. तिने धावण्याचा वेग कमी केला आणि मागे वळून पाहिले. दोघंही नराधम पोलिसांना पाहून पळून गेले होते.

आदिती पोलीस व्हॅनजवळ आली. तिने सगळी घटना पोलीसांना सांगितली. पोलीसांनी आसपासचा परीसर पिंजून काढला पण दोघंही सापडले नाही. पोलीसांनी व्हॅनमधून आदितीला घरी सोडले.

आज भारत सरकारनी सुरू केलेल्या 112India अॅपमुळे आदिती एका मोठ्या संकटातून सहीसलामत बाहेर पडली होती.

आदितीने दोघा नराधमांविरुद्ध एफआयआर दाखल केला. तिने सांगितलेल्या गाडीच्या आणि दोघांच्या वर्णनावरून तसेच कंपनीजवळ असलेल्या ड्राइव्हरच्या कॉन्ट्रॅक्ट पेपर्सवरून पोलीसांनी सातारजवळच्या एका गावातून दोघांनाही ताब्यात घेतले.

112India अॅप डाउनलोड करून इंस्टॉल केल्यावर, नाव, जन्मतारीख आणि फोन नंबर दिल्यावर ओटीपी येतो. अॅपला कॉन्टॅक्ट्स, लोकेशन, फोनकॉल्स वगैरे ची परवानगी द्यावी लागते. ह्या माहितीशिवाय इच्छित काम करणे 112India ला अशक्य असते. लगेच स्क्रीनवर अॅप लोकेशन दाखवू लागते. पोलीस, आग, मेडिकल व इतर अशी चार बटन्स दिसायला लागतात.

भारत सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये 112 हा नंबर कुठल्याही प्रकारच्या इमर्जंसी मध्ये वापरण्यासाठी खुला केला आहे. आजपर्यंत २२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही योजना कार्यान्वित झालेली आहे, इतर राज्यातही होत आहे.

पोलीस (१००), आग (१०१), आरोग्य (१०८) आणि स्त्री सुरक्षा (१०९०) हे चार नंबर ११२ नंबराखाली आणलेले आहेत. सध्या सगळ्यांजवळ स्मार्टफोन आहेत त्यामुळे अँड्रॉइड व आयफोनसाठी अॅप विकसित केलेले आहे. अॅपवर ४ पॅनिक बटन्स दिलेली आहेत – पोलीस, आग, मेडिकल व इतर. आपल्या गरजेप्रमाणे बटन दाबले तर योग्य ती मदत ६ ते १० मिनिटांत मिळू शकते.

आपली क्षमता व इच्छा असल्यास आपण स्वयंसेवक म्हणून स्वतःची नोंद करू शकतो. आपल्या भागात कुणी मदतीची याचना केल्यास ती आपल्यापर्यंतही पोचून आपण तिथे धाव घेऊन मदत करू शकतो.

बर्‍याचदा घरात फक्त वृद्ध व्यक्ती असतात. कुणा एकाच्या बाबतीत मेडिकल इमर्जन्सी उद्भवली तर दुसऱ्याला काय करावे सुचत नाही, हाक मारून बोलावण्याच्या अंतरावर कुणी नसते, मुले दूरदेशी असतात. अशा वेळी हे अॅप वापरून तात्काळ मदत मिळवता येईल. अमेरिकेतील ९११ सारखा याचा वापर व उपयोग व्हावा ही सरकारची अपेक्षा आहे. ही योजना केंद्र सरकारने निर्भया फंडमार्फत सुरू केलेली आहे. एपचा वापर करून आपले रक्षण करण्याचा प्रयत्न करणे हे तर नक्कीच आपल्या हातात आहे.

आपल्या जवळच्या व्यक्तीपर्यंत हि स्टोरी तुम्हीच पोहचवा… शेअर करा..

माहिती संकलन व प्रस्तुती : डॉ. भारती माटे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares