☆ “विंग कमांडर आशिष वर्धमान : एक चमत्कार …” लेखक : अज्ञात ☆ माहिती संकलन व प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆
जय हिंद !
आज तुम्हाला एका चमत्कारिक व्यक्तीची ओळख करून देत आहे. हे खरोखरच एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही.. ते आहेत विंग कमांडर श्री. आशिष वर्धमानजी.
युक्रेनमध्ये युद्धाच्या भयावह परिस्थितीत त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांना वाचवताना अकरा गोळ्या झेलल्या. त्यांच्या शौर्याची गाथा असीम आहे. विंग कमांडर आशीष वर्धमान यांनी युक्रेनच्या झेंडा ऑपरेशनदरम्यान त्यांच्या शरीरात रुतलेल्या अकरा गोळ्या स्वतःच्या हाताने काढल्या. ते चार वर्षे कोमामध्ये होते. त्यांचे हृदय प्रत्यारोपण झाले, तसेच पाय कृत्रिम लावण्यात आले. चार वर्षांच्या दीर्घ उपचारांनंतर ते पहिल्यांदा भारतात परतले आहेत.
त्यांचे मोठे बंधू कारगिल युद्धात शहीद झाले आहेत. त्यांची पत्नी विजयवाडा येथे कलेक्टर आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव श्री अशोक पाटनी आहे, जे आर. के. मार्बल्सचे मालक आहेत.
आशीष वर्धमान यांची माहिती म्हणजे एकामागोमाग एक आश्चर्यचकित करणारी माहिती आहे. ते स्वतः वंडर सिमेंटसारख्या प्रसिद्ध कंपनीचे मालक आहेत. श्रीराम मंदिराच्या नव्याने बांधकामासाठी लागलेला संगमरवर हा आर. के. मार्बल्सने मोफत दिला आहे. श्री अशोक पाटनी यांना दानधर्माच्या बाबतीत भामाशाह असे म्हणतात.
इतक्या सगळ्या गोष्टी असूनही विंग कमांडर आशीष वर्धमान अत्यंत साधे आणि विनम्र आहेत. ते सांगतात की त्यांच्या उपचारांवर कोट्यवधी रुपये खर्च झाले, जे रशियन दूतावास आणि भारत सरकारने केले. भारत सरकारचे मनापासून कौतुक करताना ते हास्याने भरलेली त्यांची चमत्कारिक जीवनगाथा सांगतात.
ते गलवान घाटीतही युद्धरत होते. भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी त्यांना राष्ट्रचिन्ह जडवलेली अंगठी दिली होती.
आगामी 26 जानेवारी रोजी माननीय राष्ट्रपती सुश्री द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना परमवीर चक्र प्रदान करण्यात येणार आहे. 18 जानेवारी रोजी कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात सोनी टीव्हीवर अमिताभ बच्चन यांच्या सोबत त्यांचा थेट प्रसारण होणार आहे. तुम्ही नक्की पाहा.
…लिगो म्हणजेच Laser Interferometer Gravitational-Wave Observatory.
जगातील तिसरी लिगो अमेरिकेनंतर नासा भारतात उभारत आहे. अमेरिकेबाहेर पहिल्यांदा अशी अद्यावत लिगो भारतात, आपल्या महाराष्ट्रात बनणार आहे. महाराष्ट्राच्या हिंगोली तालुक्याच्या औंढा नागनाथ इकडे लिगो आकाराला येत आहे. जवळपास १३०० कोटी रुपयांची जगातली महाग अशी प्रयोगशाळा आपल्या महाराष्ट्रात आकाराला येत असताना सो कॉल्ड मराठी आणि महाराष्ट्राचा अभिमान बाळगणाऱ्या लोकांना त्याची पुसटशी कल्पनाही नाही. नासाचे वैज्ञानिक आणि भारतातून डी. ए. ई. चे अधिकारी ह्यांची वर्दळ गेल्या काही वर्षांपासून ह्या भागात सुरु आहे. इथल्या जवळपासच्या लोकांना नासा काहीतरी मोठ्ठं प्रोजेक्ट करत आहे, इतकीच जुजबी माहिती आहे. पण वैश्विक संशोधनात कलाटणी देणारी ही अत्याधुनिक प्रयोगशाळा आपल्या माजघरात आकार घेत असताना त्याची उत्सुकता आणि त्याबद्दल जाणून घेणं खूप महत्वाचं आहे.
लिगो म्हणजे नक्की काय? समजून घेण्यासाठी आपल्याला आधी ग्रॕव्हिटेशनल वेव्ह (गुरुत्वीय लहरी) समजून घ्यावी लागेल. विश्वात अशा अनेक घटना घडत असतात की, ज्या माणसाच्या कल्पनेच्या पलीकडल्या आहेत. एकूणच विश्वाची निर्मिती आणि त्यात असलेल्या अनेक गूढ गोष्टी ह्याबद्दल अजूनही बरेच संभ्रम आणि तोकडं ज्ञान आहे. २१ व्या शतकातील तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे शोधाची अनेक नवीन दालनं उघडी झाली आहेत. त्यातलं एक दालन म्हणजेच लिगो. गेल्या शतकात विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन ह्यांनी भाकीत केलं होतं की, जेव्हा वैश्विक घटना म्हणजे कृष्णविवरांचं (Black Holes) मीलन किंवा न्युट्रॉन ताऱ्यांची टक्कर अशा घटना घडतील तेव्हा स्पेस – टाईम मध्ये त्यांच्या प्रचंड वस्तुमानामुळे आणि त्यांच्याकडे असलेल्या प्रचंड गुरूत्वीय बलामुळे लहरी तयार होतील. नदीच्या पाण्यात दगड टाकल्यावर जसे पाण्यात तरंग निर्माण होतात, त्याच पद्धतीने ह्या लहरी तयार होऊन विश्वाच्या पोकळीत प्रवास करतील. जेव्हा ह्या लहरी ग्रह तारे ह्यांवर आदळतील, तेव्हा स्पेस – टाईम मध्ये विश्व जेलीच्या बॉलसारखं आकुंचन आणि प्रसरण पावेल. ते ज्या लहरींनी होईल, त्यांना गुरुत्वीय लहरी असं म्हटलं गेलं.
पूर्ण विश्वात तरंग उमटवायला विश्वात होणारी उलथापालथ ही तितकीच प्रचंड असली पाहिजे. गुरूत्वीय लहरी त्यामुळे ओळखणं कठीण आहे. कारण ह्या तरंगांमुळे पृथ्वीचं होणारं आकुंचन आणि प्रसरण हे अवघं एका फोटाॅनच्या आकाराचं असू शकते. तसेच ह्या तरंगाची क्षमताही त्या उलथापालथीवर अवलंबून आहे. विश्वातील ज्या घटना अशा गुरूत्वीय लहरी निर्माण करू शकतात, तर दोन कृष्णविवरांचं मीलन, दोन न्युट्रॉन ताऱ्याचं एकमेकांभोवती फिरणं आणि सुपरनोव्हा. तर अशा घटना जेव्हा विश्वाच्या पटलावर घडतात, तेव्हा त्याचे तरंग गुरुत्वीय लहरींच्या स्वरूपात प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात. आधी म्हटलं तसे पृथ्वीवरही हे तरंग सतत आदळत असतात, पण ते ओळखणं आधी तंत्रज्ञानाला शक्य नव्हतं. कारण एका फोटाॅनच्या आकारात होणारा फरक मोजणारी यंत्रणा आपल्याकडे नव्हती. पण विज्ञान जसं पुढे जात आहे, त्यामुळे आता आपण तशी यंत्रणा निर्माण करू शकत आहोत. त्यामुळे ह्या लहरी जेव्हा जेव्हा पृथ्वीवर आदळतील, तेव्हा तेव्हा पृथ्वीच्या होणाऱ्या आकुंचन आणि प्रसरण ह्यावरून त्या लहरींचा स्त्रोत, ते नक्की केव्हा ही लहर अस्तित्वात आली, ह्याबद्दल सांगू शकतो.
२०१५ साली जेव्हा लिगो तयार होऊन काम करायला लागलं, तेव्हा पहिल्यांदा आपल्याला ही वेव्ह पृथ्वीवर कळाली. ही गुरुत्वीय लहर १. ३ अब्ज वर्षांपूर्वी दोन कृष्णविवरांच्या मिलनातून तयार झाली होती. म्हणजे १. ३ अब्ज वर्षांपूर्वी निघालेली ही वेव्ह तब्बल ३ लाख किलोमीटर प्रती सेकंद ह्या वेगाने पृथ्वीवर यायला इतकी वर्षं लागली. आतापर्यंत प्रकाश हे एकाच माध्यम घेऊन आपण विश्वाकडे बघत आलो आहोत. पण जेव्हा ह्या वेव्हनी १. ३ अब्ज वर्षांपूर्वीची माहिती पृथ्वीवर पोहोचवली, त्या वेळेस आपण एका नवीन दरवाजातून विश्वाकडे बघू लागलो. आईनस्टाईनने ते स्वप्न बघितलं आणि लिगोने तो दरवाजा शोधला. ४ जानेवारी २०१७ ला जेव्हा तिसरी वेव्ह लिगोने शोधली, ती तब्बल ३ अब्ज वर्षांपूर्वी तयार झाली होती. म्हणजे त्यावेळेचा पूर्ण इतिहास ही वेव्ह आपल्या सोबत घेऊन प्रवास करत होती. ह्या वेव्हच्या अभ्यासातून अनेक गोष्टी आपल्याला समजणार आहेत, ज्याबद्दल आपण अजून अनभिज्ञ आहोत. गुरूत्वाकर्षणाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोनच पूर्ण बदलून जाणार आहे.
भारतासाठी अभिमानाची गोष्ट ही की, लिगो तयार करण्यात भारतीय वैज्ञानिक अग्रेसर आहेत. आईनस्टाईनच्या ज्या थेअरी ऑफ रिलेटीव्हिटीवर आपण आज हे शोधू शकलो आहेत, ते लिगो उपकरण बनवण्यात भारतीय वैज्ञानिकांचं योगदान प्रचंड आहे. जगातील १००० हून अधिक वैज्ञानिकांत भारताच्या अनेक संशोधकांनी आपलं योगदान दिलं आहे. लिगोमध्ये दोन आर्म काटकोनात चार किलोमीटरचे असतात. जेव्हा ग्रॅव्हीटेशनल वेव्ह पृथ्वीवर आदळते. तेव्हा तिच्या आदळण्याने ह्या आर्मच्या लांबीमध्ये फरक होतो. हाच फरक लेझर, मिरर आणि अतिसूक्ष्म बदल नोंदवणाऱ्या उपकरणांनी बंदिस्त केला जातो. आनंदाची बातमी अशी की असं लिगो भारतात बांधण्यासाठी युनियन कॅबिनेटने फेब्रुवारी २०१६ मध्ये मंजुरी दिली आहे. ६७ वैज्ञानिक १३ प्रयोगशाळा (जशा DAE, TIFR, IIT Bombay, IIT Madras, IUCAA Pune, RRCAT Indore, UAIR Gandhinagar, IIT Gandhinagar, IIT Hydreabad etc. ) ह्यात सहभागी आहेत. २०२२ मध्ये लिगो तयार झाल्यावर अश्या वेव्हचा अभ्यास भारतीय वैज्ञानिकांना भारतात आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रात करता येणार आहे.
आईनस्टाईनने बघितलेलं आणि अभ्यासलेलं स्वप्न आता प्रत्यक्षात आपण अनुभवतो आहोत. ह्या विश्वाच्या पसाऱ्यात आपल्याला माहीत असलेल्या गोष्टी खूप कमी आहेत. आजवर प्रकाश ह्या एकाच दरवाज्याने आपण विश्व बघत आलो. पण आता ग्रॕव्हीटेशनल वेव्हमुळे अजून एक दरवाजा उघडला गेला आहे. ह्यातून विश्व समजून घेणे मोठे रंजक असणार आहे. ह्यात भारतीय वैज्ञानिक आणि संशोधक तितकाच समतोल वाटा उचलत आहेत, हे बघून खूप छान वाटले. विश्वाच्या ह्या नव्या दरवाज्याचं स्वप्न बघणारा आईनस्टाईन आणि ते प्रत्यक्षात उतरवणारे लिगोचे सर्वच भारतीय संशोधक ह्यांना सलाम. 🙏
लेखक : श्री विनीत वर्तक ( माहिती स्त्रोत :- गुगल, नासा )
प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(अगदी आत्ताच्या काळात सुध्दा पाण्यासाठी वणवण करणार्या, २/२ मैलांवरून पाण्याचे हंडे डोक्यावरून वाहून आणून पाण्याची गरज भागवणार्या लोकांविषयी आपण ऐकतो पाहतो. विशेषतः महिलांना हे काम करावं लागतं. पावसाच्या पाण्याला योग्य प्रकारे अडवून, ते साठवून त्याचा पिण्यासाठी, शेतीसाठी, जंगलवाढीसाठी योग्य रितीने उपयोग केला तर हे संकट टळू शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे झाबुआ या आदिवासी बहुल भागात ‘शिवगंगा’ संस्थेने केलेलं काम. )
‘माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं।
गुलाब जाई जुई मोगरा फुलवितं’।।
खरं तर आपल्या देशातील बर्याच गावांमध्ये पाटाचं पाणी ही कवी कल्पनाच राहिली आहे.
माणूस, प्राणी, पशू पक्षी, झाडं एकूणच जीवसृष्टीसाठी पाणी किती महत्वाचं आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. जीवसृष्टीच्या निर्मितीपासूनच पाण्याचं महत्व अधोरेखित झालं आहे.
महाभारतात कौरव-पांडव युध्दानंतर युधिष्ठिराच्या राज्यात एकदा नारदमुनी त्याच्या भेटीला गेले. प्रजेचे क्षेमकुशल विचारताना त्यांनी युधिष्ठीराला विचारले…
कच्चित राष्ट्रे तडागानी पूर्णानि वहन्ति च।
भागशः विनिविष्टानि न कृषि देवमातृका।।
‘हे राजा, तुझ्या राष्ट्रात जलसिंचनासाठी मोठमोठे तलाव खोदण्यात आले आहेत ना? हे सर्व तलाव पाण्याने पूर्ण भरलेले आहेत ना? शेती, देवमातृका म्हणजे केवळ पावसाच्या पाण्यावर निर्भर नाही ना? ‘ म्हणजेच पावसाचं पाणी साठवणं हे हजारो वर्षांपूर्वी सुध्दा महत्वाचं मानलं जायचं हे नारदांनी विचारलेल्या प्रश्र्नावरून सिध्द होतं.
झाबुआ हा मध्यप्रदेशातील एक जिल्हा. जिल्ह्याची लोकसंख्या १०२४०९१ (२०११ च्या जनगणनेनुसार) आहे. जिल्ह्याची समुद्रसपाटीपासून उंची११७१’ आहे. साक्षरतेचं प्रमाण ४४. ४५% आहे. प्रमुख नद्या माही, अनास या आहेत. जिल्ह्यामध्ये जवळ जवळ ३७%लोक भिल्ल, भिलाला आणि पटालिया या जनजातींचे आहेत. इथल्या जनजातींबद्दल बरेच गैरसमज पसरविले गेले होते. त्यांना बदनाम करण्यात आले होते.
झाबुआ जिल्ह्यात पाऊस बर्यापैकी पडतो. पण ते पाणी अडविण्याची सोय नसल्यामुळे सर्व पाणी वाहून जात असे. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण होई. पिण्याला पाणी मिळणे दुरापास्त होई. जंगले उजाड होत. जल, जंगल, जमीन यावर अवलंबून असलेले आदिवासी ना धड शेती पिकवू शकत ना जंगल संपत्तीवर गुजराण करू शकत. त्यामुळे त्यांना कामाच्या शोधात गुजराथ, महाराष्ट्र किंवा इतर राज्यात जावे लागे.
काही संस्थांनी या भागात पाण्याच्या व इतर समस्यांवर कामं केली पण त्यात त्यांनी आदिवासींना सहभागी करून घेतले नाही. त्यांच्या समस्या जाणूनच घेतल्या नाहीत. त्यामुळं ही कामं वरवरची झाली. त्यांच्या समस्या तशाच राहिल्या.
या समस्या खर्या अर्थी दूर केल्या पद्मश्री प्राप्त महेशजी शर्मा आणि त्यांच्या टीम मध्ये असलेल्या डाॅ. हर्ष चौहान, राजाराम कटारिया आणि इतर सहकार्यांनी.
पद्मश्री प्राप्त महेशजी शर्मा, संघाचे स्वयंसेवक. १९९८ला संघाने त्यांच्यावर वनवासी कल्याण परिषदेची जबाबदारी सोपवली. महेशजींनी झाबुआ जिल्ह्यात प्रवास केला. लोकांमध्ये मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या लक्षात आलं की, ज्या लोकांना चोर, दरवडेखोर ठरवून त्यांच्याबद्दल गैरसमज पसरविण्यात आले आहेत. प्रत्यक्षात हे लोक अतिशय प्रामाणिक, कष्टाळू आहेत. कोणाचे पैसे बुडवत नाहीत. एकमेकांना मदत करण्याची वृत्ती आहे. फक्त त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यांची पाणी ही मुख्य समस्या आहे. म्हणून शर्माजींनी त्यावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले.
२००७ साली त्यांनी ‘ शिवगंगा ‘ प्रकल्पाची स्थापना केली. त्यांच्या मदतीला होते, दिल्ली आय आय टी मधून सुवर्णपदक प्राप्त करून एम् टेक् झालेले, देश-विदेशातील उच्चपदस्थ नोकर्यांकडे पाठ फिरवलेले, संघ प्रचारक, भिल्ल राजघराण्यातले श्री. हर्ष चौहान आणि जनजातीतील राजारीम कटारिया, ज्यांनी पदवी प्राप्त केल्यानंतर जनजातीतील लोकांसाठीच काम करायचे ठरविले. हे तिघे वत्यांचे इतर साथीदार यांनी झाबुआला जलमय करायचे ठरविले.
या टीमने प्रथम गावातील तरूणांबरोबर संवाद साधला. संकटात साह्य करणार्या गावातील तरूणांचे सघटन केले. इंदोर मध्ये ‘ ग्राम इंजिनियर वर्क ‘ या संस्थेमध्ये त्यांना प्रशिक्षण दिले. पहिल्यांदा ६ ‘ उंचीचे तलाव बांधून पाणी अडविण्यास सुरूवात केली.
महाभारतातील कथेनुसार भगिरथाने तपश्र्चर्या करून गंगा पृथ्वीवर आणली तेव्हा तिचा आवेग पृथ्वीला सहन होणार नाही म्हणून शंकराची प्रार्थना करून त्याच्या जटांमधून ती जमिनीवर आणली.
अगदी याच तत्वाचा अवलंब करून ‘शिवगंगा ‘ च्या कार्यकर्त्यांनी२००७ पासून पाणी अडविण्यास सुरूवात केली. पावसाळ्यात डोंगरातून धो धो वाहणारे, नुसतेच वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा पिण्यासाठी, शेतीसाठी उपयोग करण्यात येऊ लागला. लोकांच्या साह्याने तलाव बांधले गेले. हजारो बांध बांधले. ग्राम अभियंत्यांना; समतल रेषा, (कंटूर) काढण्याचं, बांध बंदिस्ती, नाला बंडिंगचं, पाणलोट, वृक्ष लागवड यांचं शास्रीय शिक्षण देण्यात आलं. इंजिनिअर्स आणि स्थानिक लोकांच्या सहकार्याने हाथीपावा पहाडावर १ लाख ११ हजार समतल रेषा (कंटूर ट्रेन्स) पाणी प्रकल्प राबविले. ३५० गावांमध्ये रिचार्जींग हॅंडपंप बसविण्यात आले. ४५०० मेड बंधान, चेक डॅम, तलाव इ. च्या माध्यमातून करोडो लिटर पाणी जमिनीत मुरले आणि जमिनीतील पाण्याचा साठा वाढला. झाबुआ जिल्हा दुष्काळ मुक्त झाला. जिथे वर्षात एकदा मक्याची शेती व्हायची तिथं वनवासी लोक गव्हाची शेती करायला लागले. वर्षातून दोन पिकं घेऊ लागले.
शेतीबरोबरच त्यांना हस्तकलेचे, बांबूपासून निरनिराळ्या वस्तू तयार करण्याचे, कुंभारकामाचे शिक्षण देण्यात आले. बी-बियाणे, वनौषधी यांच्या पारंपारिक जतन करण्याच्या पध्दतीला चालना देण्यात आली.
हलमा… या लोकांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ‘ एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ ‘या उक्तीनुसार संकटात असलेल्या भिल्ल कुटुंबाला, सर्व कुटूंबे एकत्र येऊन साह्य करतात. उदा. एखाद्याचे घर पडले तर गावातील सर्वजण एकत्र येऊन त्याचे घर उभे करून देतात.
पडजी… शेतीचे काम असेल तर ८/१० कुटुंबं एकत्र येतात आणि शेतातील कामं निपटतात.
मातानुवन… हा उत्सव वर्षातून ५/६ वेळा सर्व भिल्ल एकत्र येऊन साजरा करतात.
वृक्षारोपण… दुष्काळामध्ये झाडं लावणं बंद झालं होतं. पण आता पुन्हा वन उभारणीचे काम सुरू झाले आहे. ११० गावात ७०, ००० वर झाडे लाऊन झाली आहेत.
विशेष म्हणजे रूरकी, मुंबई, दिल्ली इ. ठिकाणच्या IIT चे विद्यार्थी इथे प्रशिक्षणास येतात.
‘शिवगंगा’ प्रकल्पाने फक्त जलसंवर्धनाचेच काम केले नाही तर आदिवासींचा सर्वांगीण विकास, ग्रामविकास, स्वयंरोजगार याबरोबरच जगाला पर्यावरण संरक्षणाचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.
☆ “मकर संक्रांत आणि खगोलशास्त्र…” ☆ श्री जगदीश काबरे ☆
पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे सूर्याच्या मागील अवकाशाची पार्श्वभूमी बदलते आणि सूर्य वेगवेगळ्या नक्षत्रांमधून जात असल्याचे दिसते. संपूर्ण चक्र 12 भागांमध्ये विभागले गेले आहे ज्याला राशिचक्र म्हणून ओळखले जाते आणि ज्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. त्या दिवशी मकर संक्रमण होते. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालताना, सूर्याच्या पार्श्वभूमीवर राशीचक्र बदलत असताना पृथ्वीच्या अक्षाचा कल सारखाच राहतो. परंतु, त्यामुळे एक गोलार्ध सूर्यासमोर सहा महिने आणि दुसरा सहा महिने सूर्याच्या मागे राहतो. यामुळे पृथ्वीवरील सूर्यकिरणांचा कोन सतत बदलत राहतो आणि सूर्य सहा महिने उत्तरेकडे आणि सहा महिने दक्षिणेकडे फिरल्याचा आभास देतो. यालाच भौगोलिक भाषेत उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणतात. मकर संक्रांतीत सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. कारण सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्रांतीनंतर, उत्तर गोलार्धात सूर्य उत्तरेकडे जाऊ लागतो आणि हिवाळा कमी होऊ लागतो. भारतासह उत्तर गोलार्धात उन्हाळा वाढू लागतो. हे 21 जूनपर्यंत होते, त्यानंतर सूर्याचे दक्षिणायन सुरू होते.
मकर संक्रांतीनंतर दिवस मोठे होतात आणि रात्री लहान होतात, उत्तर गोलार्धात 14-15 जानेवारीपर्यंत सूर्यास्ताची वेळ हळूहळू पुढे सरकते. त्यानंतर 21 मार्च ही तारीख येते, जेव्हा दिवस आणि रात्र अगदी समान असतात त्याला इक्विनॉक्स म्हणतात. याचा अर्थ सूर्य जवळजवळ उत्तर गोलार्धाच्या मध्यभागी असतो. सूर्यास्ताच्या वेळेत हळूहळू बदल होणे म्हणजे हिवाळा कमी होतो, त्यानंतर उन्हाळा वाढायला सुरुवात होते. कारण सूर्य उत्तर गोलार्धात जास्त काळ राहणार असतो.
सूर्याभोवती पृथ्वी फिरते हे सर्वज्ञात आहे, पण पृथ्वीवरून पाहताना पृथ्वीभोवती सूर्य फिरतो असं भासतं. याला सूर्याचं भासमान भ्रमण असं म्हणतात. सूर्य उगवताना ज्या तारकासमूहांच्या पार्श्वभूमीवर तो दिसतो ती जागादेखील रोज बदलते. एक-दोन दिवसांमध्ये सूर्याच्या स्थानातला बदल फार लक्षणीय नसतो. पण महिन्याभरात ही जागा अगदी निश्चितपणे बदललेली दिसते. आणि वर्षभरानंतर सूर्य पुन्हा नेमक्या त्याच तारकासमूहाच्या पार्श्वभूमीवर नेमक्या त्याच जागी दिसू लागतो. या तारखासमूहांना त्यांच्या आकारावरून जी नावे दिली गेली त्यांनाच आपण राशी म्हणतो. थोडक्यात, वर्षभरात सूर्य या विविध तारकासमूहांमधून भ्रमण करतो आहे असं भासतं म्हणजेच सूर्य विविध राशीमधून प्रवास करत असतो. वर्षभरात सूर्याच्या या भासमान भ्रमणाचा जो मार्ग त्याला ‘क्रांतिवृत्त’ असं म्हणतात.
या क्रांतिवृत्तावर सूर्याचं नेमकं स्थान कसं सांगायचं? मग त्यासाठी या क्रांतिवृत्ताचे बारा भाग पाडले आहेत. या बारा भागांना नावं देणं आलं. त्या प्रत्येक भागात दिसणाऱ्या तारकासमूहातले तारे काल्पनिक रेषांनी जोडले (हे म्हणजे लहानपणी ‘बिंदू जोडून आकृती तयार करा’ असा खेळ असायचा तसंच झालं!) तर तयार होणाऱ्या आकृतीचं पृथ्वीवरच्या विविध गोष्टींशी साधर्म्य आहे असं लक्षात आलं आणि नावांचा प्रश्न सुटला. मग ज्या तारकासमूहातली आकृती मगरीसारखी दिसत होती त्याला नाव दिलं मकर रास, वगैरे वगैरे. अनेकांना असं वाटतं की, राशींनी या अथांग अंतराळाचे बारा भाग केले आहेत. तसं मुळीच नाही. राशी या केवळ सूर्याच्या भासमान भ्रमणमार्गाचे भाग आहेत. आणि सूर्याचा भासमान भ्रमणमार्ग हा या अथांग अंतराळावर मारलेला एक छोटासा काल्पनिक पट्टा आहे.
वैज्ञानिकदृष्ट्या बोलायचे झाले तर सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात खरे तर 21 डिसेंबर होते, जेव्हा सूर्य दक्षिणायन संपवून उत्तरेकडे सरकायला लागतो. परंतु, भारत आणि उत्तर ध्रुवाच्या दरम्यान असलेल्या देशांमध्ये हा प्रभाव मकर संक्रांतीच्या दिवशी अधिक प्रभावी मानला जातो. ती तारीख 14 किंवा 15 जानेवारी असते. सध्या हा फरक 24 दिवसांचा आहे. तसेच दर वर्षीचा नऊ मिनिटे दहा सेकंद हा काळ साठत साठत जाऊन दर 157 वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस आणखी एक दिवसाने पुढे जातो. दर 1500 वर्षांनी पृथ्वीच्या परिभ्रमणाच्या अक्षात होणाऱ्या बदलामुळे हा फरक दिसून येतो. आजपासून 1200 वर्षांनंतर ही तारीख बदलून फेब्रुवारी महिन्यात येईल. 2001 ते 2007 पर्यंत 14 जानेवारीला मकर संक्रांत येत होती. पण 2008 मध्ये 14 जानेवारीला 12. 07 मिनिटांनी संक्रांत आली, त्यामुळे संक्रांतीचा सण त्याच वर्षी 15 जानेवारीला झाला. दरवर्षी ही वेळ 6 तास 9 मिनिटांनी पुढे सरकते आणि चार वर्षांत ती 24 तास 36 मिनिटांनी पुढे सरकते. परंतु, लीप वर्षामुळे ती 24 तासांनी मागे सरकते म्हणजेच दर चार वर्षांनी ती 36 मिनिटांनी पुढे सरकते. काही वर्षांत संक्रांतीची तारीख पुढे सरकते. सन 2009 ते 2012 पर्यंत संक्रांतीचा दिवस 14-14-15-15 होता. हे चक्र 2048 पर्यंत चालू राहील, त्यानंतर ते 14-15-15-15 असेल. नंतर 2089 पासून ते 15-15-15 -15 होईल. हे दर 40 वर्षांनी होईल. परंतु, 2100 हे वर्ष लीप वर्ष असूनही, 400 ने भागल्यास लीप वर्ष मानले जाणार नाही, कारण ग्रेगरियन कॅलेंडरच्या नियमाप्रमाणे शतकपूर्तीच्या अंकास चारशेनी भाग जात नसेल, तर त्या वर्षी लीप वर्ष धरले जात नाही. त्यामुळे दर चारशे वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस तीन दिवसांनी पुढे जातो. म्हणून 2100 ते 2104 पर्यंत संक्रांतीच्या तारखा 16-16-16-16 अशा असतील.
सामान्यतः भारतातील सर्व सण हे चंद्राच्या चक्रानुसार असतात, त्यामुळे इंग्रजी दिनदर्शिकेनुसार त्यांच्या तारखा दरवर्षी बदलतात. म्हणूनच होळी, दिवाळीसारखे सण वेगवेगळ्या तारखांना येतात. परंतु मकर संक्रांती हा एकमेव सण आहे, जो सूर्याच्या भासामान भ्रमाणावर आधारित असतो. इंग्रजी कॅलेंडर देखील सूर्याच्या यात गतीवर आधारित आहे. म्हणून मकर संक्रांत दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला सध्या येते.
☆ ‘विश्वमैत्री’ दिन अर्थात ‘मकर संक्रमण’… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले☆
राम राम मंडळी !!
ईश्वर कृपेने आपण सर्वजण सकुशल असाल. मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपल्याला हा अक्षररूप तिळगुळ पाठवीत आहे.
” तिळगुळ घ्या गोड गोड बोला।”
पारंपारिक पद्धतीने मकरसंक्रांती साजरी करीत असताना आपण सर्वांना तिळगुळ देतो आणि त्यावेळी आपल्या तोंडात वरील उद्गार सहज येत असतात. हे नुसतं ऐकायलाही किती गोड वाटतं. आज सामाजिक प्रसार माध्यमांच्या काळात सुद्धा एका अर्थाने निर्जीव तिळगुळ आपण एकमेकांस पाठवतो आणि त्यात सुद्धा खरा तिळगुळ मिळाल्याचा, खाल्याचा आनंद मानतो. किती लोकविलक्षण आहे हे! हिंदू धर्म सोडला तर जगाच्या पाठीवरील आज अस्तित्वात असलेल्या आणि नसलेल्या कोणत्याही धर्मात अशी परंपरा असल्याचे ऐकिवात नाही. काय कारण असेल याच्यामागे ? असे कोणाला सुचले नसेल की तशी बुद्धीच झाली नसेल ? हे असे अनेक प्रश्न माझ्या मनात आले. आता एखाद्याच्या मनात प्रश्न का यावेत याचे वस्तुनिष्ठ उत्तर देणे तसे अवघडच. वरील प्रश्नाचा विचार करताना असे जाणवले की केवळ आपला हिंदू धर्म सर्वसमावेशक आहे. तो ‘भोगावर’ आधारित नाही तर ‘त्यागावर’ आधारित आहे. ज्याप्रमाणे निसर्गातील प्रत्येक वस्तू आपल्याजवळील प्रत्येक वस्तू दुसऱ्याला देण्यात समाधान मानते तसे हिंदू धर्म देखील देण्यात समाधान मानणारा, त्यागावर श्रद्धा ठेवणारा आहे. नुसता श्रद्धा ठेवणारा नाही तर तसे आचरण करणारा आहे.
“पेड हमे देते है छाया,
हवा नया जीवन देती है।
भूख मिटाने को हम सबकी,
धरती पर होती खेती है।।”
औरोंका भी हीत हो जिसमे
हम भी तो कुछ करना सिखे।”
मकरसंक्रातीचा सण साजरा करण्यास कधी सुरुवात झाली ? पहिला सण (संक्रांत ) कधी साजरी केली गेली याची नोंद इतिहासास ठाऊक नाही. अर्थात ही झाली पुस्तकी माहिती. पण आपण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हिंदू धर्मात असे लिहून ठेवणे, त्याचे श्रेय (स्वामित्व) घेणे आणि ‘स्वामीत्वा’च्या जीवावर ज्ञान बंदिस्त ठेवणे अपेक्षित नसावे म्हणून तर आपल्याकडील विविध प्राचीन विश्वविद्यालयात ज्ञान निःशुल्क मिळत असे आणि ते सर्वांना सुलभ होते. इतिहासात असे वर्णन आहे की परदेशातून हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रात / विषयांत ज्ञान प्राप्त करण्यासाठी येत असत.
सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून मकर संक्रमण असे म्हटले जाते. सूर्य जेव्हा कर्क राशीत प्रवेश करतो तेव्हा कर्क संक्रमण अर्थात दक्षिणायन सुरु होते, तर मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा उत्तरायण सुरु होते. उत्तरायण म्हणजे देवांचा दिवस आणि दक्षिणायन म्हणजे देवांची रात्र. फार पूर्वी ही संक्रांत २३ डिसेंबर ला साजरी केली जायची. परंतु सूर्याच्या गतीचे गणित लक्षात घेता तर ७८ वर्षांनी ती एकेक दिवस पुढे जात ती आज १४ जानेवारी पर्यंत पुढे आली आहे. अशी हळूहळू ती पुढेच जात राहील. खगोल अभ्यासक असे म्हणतात की की ही संक्रांत काही शे वर्षांनी मार्च महिन्यात अर्थात ऐन उन्हाळ्यात येईल.
मकरसंक्राती आपल्याकडे साधारण तीन दिवस साजरी करण्यात येते. भोगी, संक्रांत आणि किक्रांत. संक्रांत ही देवी असून देवीने शंकासूर आणि किंकरासूर राक्षसांवर मिळविलेला विजय म्हणून हा सण साजरा केला जातो. हीचे स्वरुप नेहमीप्रमाणे प्रसन्न, मंगलदायक नसून लांब ओठ, एक तोंड, दीर्घ नाक, नऊ बाहू असे आहे. थोडी अक्राळविक्राळ आहे. दरवर्षी हिचे वाहन, अस्त्र, शस्त्र, अवस्था, अलंकार वेगवेगळे असतात. आपले अलंकार आणि वस्त्र यातून ती भविष्यकाळ सुचवीत असते, असे मानले जाते. ‘संक्रांत आली’ अशी म्हण यामुळेच असावी असे म्हणता येईल.
दक्षिणायन संपून उत्तरायण सुरु होते तो काळ थंडीचा असतो. त्यामुळे त्यावेळी तीळ आणि गूळ खाण्याची पद्धत आहे. तीळ हे थंड, स्निग्ध असतात तर गूळ उष्ण, बलवर्धक आहे. शरीर बळकट होण्यासाठी हे दोन्ही पदार्थ आवश्यक आहेत आणि मुख्य म्हणजे हे दोन्ही पदार्थ सामान्य मनुष्यास सहज उपलब्ध आहेत. हा सण देशाच्या विविध भागात विविध नावाने साजरा केला जातो.
*आपल्याकडील कोणताही सण साजरा करण्याचे मुख्य प्रयोजन ‘सामाजिक बांधिलकी’ हेच असते. खास करुन रक्षाबंधन आणि मकरसंक्राती हे दोन सण विशेष करुन सामाजिक बांधिलकी जपणारे आहेत असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही असे मला वाटते. एका सणात भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. तसे कंकणच बांधून घेतले आहे. जर अगदी मनापासून आणि व्यापक बुद्धीने हे कंकण प्रत्येक भाऊ (पुरुष) आपल्या मनगटावर बांधेल तर प्रत्येक बहीण (स्त्री )निरंतर सुरक्षित राहील. तसेच मकर संक्रांतीच्या निमित्ताने ‘तिळगूळ घ्या गोड गोड बोला’ हे सूत्र समाजातील प्रत्येक घटक पाळेल तर सारा भारत एक क्षणात तंटामुक्त होईल.
आपल्याकडे सर्व आहे. ज्ञान, विज्ञान अगदी सर्व आहे. फक्त डोळसपणे त्याकडे बघण्याची गरज आहे, काळानुरूप सणांचे अर्थ लावून ते समजून घेण्याची, आचरणात आणण्याची गरज आहे. पूर्वी उद्योगांचा एकेक आदर्श नमुना आपल्याकडे होता. यास ‘स्वयंपूर्ण खेडी’ असे म्हटले जायचे. बारा बलुतेदार होते. ही बारा लोकं एकत्र येऊन एकदिलाने गावागाडा नुसती हाकत नव्हती तर कुटिरोद्योगाच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीत आपला सहभाग घेत होती. कोणी मोठा नव्हता आणि छोटा नव्हता. सर्व एकसमान होते. इंग्रज येईपर्यंत ही परंपरा टिकली. परंपरागत व्यवसाय असल्यामुळे कारागीर गुणवत्तावान, कुशल होते. १४ विद्या आणि ६४ कला जगाला अलंकृत करीत होत्या. परंतु हे पांढऱ्या पायाच्या इंग्रजांना रुचले नाही, त्यांनी कारागिरांचे अंगठे तोडले, हात तोडले, पाय तोडले नि देशी उद्योग नष्ट केले. बेकारी हा शाप इंग्रजांनी दिलेला आहे. त्यांनीच जातीपातींना उच्च नीच असा दर्जा दिला. इतक्या वर्षांच्या गुलामगिरीमूळे आपल्याला सुद्धा इंग्रज सांगून, लिहून गेले तेच खरे वाटते, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. ढाक्क्याची मलमल प्रसिद्ध होती. त्यावेळी तलम पातळाची ( साडीची) घडी काडेपेटीत राहत असे वर्णन खुद्द इंग्रजांनी केलेले आहे. आज पुन्हा याचे स्मरण करण्याची गरज आहे. जे आपला इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत असे म्हटले जाते. त्यामुळे आपण आपला जाज्वल्य पराक्रमाचा आणि विजयाचा इतिहास न विसरता पुढील पिढीत संक्रमीत करण्याची गरज आहे. ती काळाची मागणी आहे असे मला वाटते. सर्व काही सरकार करेल ह्या भ्रमात आपण राहू नये यापेक्षा जे मी करु शकतो ते मीच करेन आणि अगदी आत्तापासून करेन असा संकल्प आपण सर्वांनी या संक्रांतीच्या निमित्ताने करुया. *
देवीने शंकासुर आणि किंकरासुरावर विजय मिळविला. आपण मनातील शंकाकुशंका, हेवेदावे, समजगैरसमज, अनिष्ट रूढी, वाईट चालीरीती, भेदाभेद यावर विजय मिळवून एकसंघ, समरस हिंदू समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करुया. आज दुष्ट शक्ति जाणीवपूर्वक हिंदू समाजात फूट पाडण्याचे काम करीत आहेत. पण हिंदू विचार जा जोडणारा आहे. आणि दैनंदिन व्यवहारात तोडणाऱ्या पेक्षा जोडणाऱ्यालाच जास्त प्रतिष्ठा मिळते हे कोणीही विसरु नये. ‘भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत’ असे म्हणून किंवा अशी वाक्ये नुसाती तोंडपाठ करुन आता चालणार नाही तर हे सर्व कृतीत आणण्यासाठी आपण आज वचनबद्ध होऊया. माझे घर सोडून शेजारी, गावाच्या शेजारी असलेल्या माझ्या बंधूला मी तिळगूळ देईन आणि परस्परातील सुप्त रुपात असलेला स्नेह प्रगट करुन वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करेन असा निश्चय आपण सर्वांनी करुया आणि ‘विश्वमैत्री दिन’ साजरा करुया
☆ “जुने जाऊ द्या मरणालागुनी…” ☆ श्री जगदीश काबरे ☆
खरे तर इतिहासकाळात आपल्या देशावर अनेकवार आक्रमणे का झाली आणि वारंवार हा देश आक्रमकांपुढे का नमला याची कारणे अज्ञात नाहीत. त्या त्या काळातला समाज एकसंध नव्हता. जातीभेदांनी चिरफळ्या उडालेला होता आणि तो काळाबरोबर ‘बदलत नव्हता. तो ‘स्टॅटिक’ होता. ‘श्रुती-स्मृती-पुराणोक्त’ या चक्रात अडकलेला होता. कोण आला, कोणी राज्य केलं याच्याशी इथल्या समाजाला काही देणंघेणं नव्हतं.
आक्रमक नवे विज्ञान आणि तंत्रज्ञान घेऊन आले. घोड्यांच्या रिकिबीचा शोध ज्यांना लागला, ज्यांना माहीत झाला, त्या टोळ्या रणांगणावर प्रबळ ठरल्या आणि मग गझनीचा महंमद आणि चेंगीजखान धाडी घालून आपल्याला लुटून गेले. त्यानंतर आलेले आक्रमक बंदुका घेऊन आले, तोफा घेऊन आले, वाफेची शक्ती घेऊन आले आणि दरवेळी आपल्याला हरवत राहिले. कोणतेही नवीन तंत्रज्ञान निर्माण न करणारा, भविष्यकाळाचा विचार न करणारा आणि ‘श्रुती-स्मृती-पुराणोक्त’ पद्धतीने भूतकाळात रमणारा आपला. समाज सतत हरत राहिला.
दुर्दैवाने आज अशा विचारसरणीला मिळणारा पाठिंबा वाढत आहे. हे पुच्छप्रगतीचे लक्षण आहे. ज्या दोषांमुळे आपल्या इतिहासात अंधारयुग येऊन गेले त्याच दोषांच्या आपण परत आहारी जात आहोत याचे ते लक्षण आहे. ‘श्रुती-स्मृती-पुराणोक्त’ ही भावना आणि पूर्वजांचे गुणगान करण्यात धन्यता मानण्याची भावना या दोन्ही भावना परत बळकट होत असल्याचे हे लक्षण आहे.
युरोपात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्याच्या काळात गॅलिलिओला ख्रिश्चन धर्माच्या संघटनेशी–चर्चशी संघर्ष करावा लागला. आपल्या समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन असेल, तर इतिहासात जगण्याच्या आपल्या या प्रवृत्तीशी संघर्ष करावा लागेल. अशा प्रवृत्तीला प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे खतपाणी घालणाऱ्या विचारधारांविरुद्ध संघर्ष करावा लागेल. जरूर पडली तर केशवसुतांसारखा निर्भीडपणे पुकारा करावा लागेल :
‘जुने जाऊ द्या मरणालागुनि, जाळूनी किंवा पुरुनि टाका !
सडत न एक्या ठायी ठाका, सावध ऐका पुढल्या हाका !’
हे काम सोपे नाही. हा संघर्ष सोपा नाही. पण ज्यांना हा देश, हा समाज एकविसाव्या शतकात खऱ्या अर्थाने समर्थ व्हावा असे वाटत असेल, तर त्यांना या संघर्षासाठी सिद्ध व्हावेच लागेल. असा संघर्ष उभा राहतो की नाही आणि तो कोण जिंकतो यावरच ‘भारतात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजणार की नाही’ या प्रश्नाचे उत्तर अवलंबून आहे.
98 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष डॉ तारा भवाळकर यांना सांगलीत काकासाहेब गाडगीळ साहित्य पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा पार पडला. काकासाहेब गाडगीळ हे नुसतेच राजकारणी नव्हते तर साहित्यिकही होते. ‘ग्यानबाचे अर्थशास्त्र’ लिहिणाऱ्या काकासाहेब गाडगीळ यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार हा लोकसंस्कृतीच्या अभ्यासक डॉ तारा भवाळकर यांना देण्यात एक औचित्य साधले आहे. याप्रसंगी काकासाहेबांचे नातू अनंत गाडगीळ यांनी काका साहेबांच्या आठवणी जागवल्या, त्याच वेळेला ताराबाईंच्या साहित्याचे मर्मही सांगितले.
याप्रसंगी ताराबाई बोलताना अनेक आठवणीत रमल्या. त्यांच्या भाषणात त्यांनी एक महत्त्वाचे उद्घृत केले. ते म्हणजे ‘शिक्षणाने माणूस साक्षर होतो, शिक्षित होतो, पण सुशिक्षित होईलच असे नाही. माणसाला शिक्षणामुळे शहाणपण येईलच असेही नाही. याची बरीचशी उदाहरणे आज आपण अवतीभवती पाहत आहोत. बहिणाबाई निरक्षर होत्या पण त्यांच्यात जे शहाणपण होते ते आजच्या उच्च शिक्षित माणसातही सापडणे दुर्मिळ आहे. मराठीला नुसता अभिजाततेचा दर्जा मिळून उपयोगी नाही तर मराठी माणसाने मराठी भाषा जगवली पाहिजे. याप्रसंगी त्यांनी संस्कृतीची सोपी सुटसुटीत व्याख्या सांगितली. ती म्हणजे ‘मी माझ्या भोवतीचे लोक जसे वागतात ती संस्कृती होय. ‘
या 80 वर्षाच्या तरुणीने आपल्या खणखणीत आवाजात जवळजवळ तासभर उत्तम ओघवत्या भाषेत भाषण करून श्रोत्यांना भरभरून वैचारिक मेजवानी देऊन मुग्ध केले त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. याप्रसंगी त्यांना मिळालेल्या सत्काराची रक्कम त्यांनी संवेदना वृद्धाश्रम, आकार फाउंडेशन या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना दिली. यात त्यांच्या मनाचे मोठेपण तर दिसून येतेच, पण त्याचबरोबर त्यांच्यात सामाजिक बांधिलकीची जाणही किती खोलवर रुजली आहे हे प्रकर्षाने जाणवते. या नेत्र सुखद आणि मेंदूला वैचारिक खाद्य देणाऱ्या कार्यक्रमाची ही काही क्षणचित्रे…
☆ “आईशी खोटं बोलणारा सैनिक !”☆ श्री संभाजी बबन गायके☆
कान्हा गोपगड्यांसह एखाद्या गवळणीच्या घरात चोरपावलांनी शिरून शिंक्यावर टांगलेलं लोणी फस्त करायचा! गवळणी यशोदेकडे गाऱ्हाणं मांडायच्या… ती बाळकृष्णाचा कान धरायची… पण मेघःश्याम म्हणायचा… ‘मैं नहीं माखन खायो!’ आणि त्या भोळ्या माउलीला तेच खरं वाटायचं… ती उलटून गोपिकांना म्हणायची… ‘तुमची एवढीच रीत खोटी गे गोकुळच्या नारी!’
याचीही आई अशीच भोळी यशोदा… पोरगं नुकतंच फौजेत गेलं आहे. काही महिन्यांसाठी त्याला विशेष लढाऊ विभागात पाठवलं गेलं आहे… अतिरेक्यांशी प्रत्यक्ष लढण्याचा अनुभव यावा म्हणून. हा कालावधी लवकरच पूर्ण होणार आहे. तिथून तो माघारी आला रे आला की त्याला चतुर्भुज करण्याचा चंग यशोदेने बांधला आहे.
ती रोज त्याला विडिओ कॉल करून त्याची याची देही याची डोळा ख्यालीखुशाली विचारल्याशिवाय झोपायची नाही.
त्या दिवशीच्या रात्रीही तिने त्याला फोन लावलाच. आधुनिक सोय आहे आणि शक्य आहे तर का नाही बोलायचं लेकाशी? तो बालवर्गात जायचा तेंव्हा ही त्याची शाळा सुटेपर्यंत व्हरांड्यात बसून राहायची शाळेच्या. एकुलता एक, नवसाने झालेला मुलगा तो.. नाव दीपक ठेवलं होतं… कुलदीपक. दोन मुलींच्या पाठीवर झालेला दीपक!
फोन लागला… दीपक बनियान वरच निवांत बसलेला दिसला तिला. नेहमीचा संवाद सुरू झाला मायलेकात.
“दीपक, बेटा, सब ठीक?”
“हां मां, सब ठीक! शांती है!”
“खाना खाया?”
“हां मां!”
आणि असंच बोलणं होत राहिलं… “लवकर सुट्टीवर ये.. तू मामा झाला आहेस… भाचा वाट पाहतोय मामाची! तुझ्या विना घर सुनेसुने वाटते!”
“हां मां.. बस यहाँ का काम पुरा होते ही घर आऊंगा! बस, अब देर हो रही है! तुम सो जावो!”
“और, तुम बेटे? कब सोने जावोगे?”
“बस मां, अभी सोने ही जा रहा था! अच्छा, गुडनाईट!”
कॅप्टन दीपक, राष्ट्रीय रायफल्स. जम्मू – काश्मीर मध्ये तैनात. २०२० मध्ये भरती. वय चोवीस. वडील उत्तराखंड मध्ये पोलिस अधिकारी.
आईशी दीपक विडिओ कॉल वर असताना लांबून स्क्रीनमध्ये डोकावणाऱ्या वडिलांच्या नजरेतून काही गोष्टी सुटायच्या नाहीत! दीपक जरी बनियान घालून बसलेला दिसत असला तरी मागे त्याचे मळलेले बूट दिसताहेत… रायफल टेकवून ठेवलेली असली तरी वापरलेली दिसते बरीच! मागे त्याचे सहकारी थकून भागून बसलेले दिसत आहेत!.. दिपकच्या डोळ्यांत लालसर झाक दिसते आहे आणि आवाजात काहीसा कंप.
दीपक खोटं बोलतोय आईशी! दिवसभर मोहिमेवर होता… आणि आज रात्रीही निघायची तयारी सुरू आहे… आणि आईला म्हणतोय… झोपायला निघालो आहे!
दिपकच्या वडिलांनी पोलिसातून स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. ते आपल्या मुलाला पुरते ओळखून आहेत… दीपक धाडसी आहे, पुढे होऊन नेतृत्व करणारा आहे. स्वतः प्रयत्न करून सैनिक अधिकारी झाला आहे. काश्मीर मध्ये गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानी अतिरेक्यांची घुसखोरी वाढली आहे.. काही सैनिक व अधिकाऱ्यांना हौतात्म्य प्राप्त झाले आहे.
दीपकचे वडील टीव्हीवर काश्मिरच्या बातम्या लागल्या की टीव्ही बंद करून टाकायचे दीपकची आई खोलीत आली की!
त्याच रात्री कॅप्टन दीपक अतिरेकीविरोधी शोध आणि नाश मोहिमेवर गेला… अतिरेक्यांना शोधले… पुढे होऊन एका अतिरेक्याच्या मेंदूत चार गोळ्या डागल्या… पण बदल्यात आपल्या छातीवर तीन गोळ्या झेलल्या… आणि तरीही लढत राहिला… मोहिमेचे नेतृत्व करीत राहिला!
साथीदारांनी इस्पितळात पोहचवले…. रात्री आईला सांगितल्याप्रमाणे झोपी गेला… कायमचा! एका कुळाचा एक कुलदीपक विझून गेला!
रात्रंदिन युद्धाचा प्रसंग आहे काश्मिरात. या काळोखात जीव तळहातावर घेऊन तरुण कोवळे अधिकारी, जवान मृत्युला आव्हान देत असतात! त्यांना तुमचे आशीर्वाद पाहिजेत!
स्वातंत्र्यदिनाच्या आधल्या रात्री कॅप्टन दीपक सिंग हुतात्मा झाले ! भावपूर्ण श्रद्धांजली !
☆ राष्ट्रमाता जिजाबाई… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले☆
आज विलक्षण योगायोग आहे. आज एका ‘वीरमाते’चा आणि एका ‘संन्यासी योद्धा’ यांचा जन्मदिन आहे. आपल्या लक्षात आलेच असेल की मी कोणाबद्दल बोलत आहे. हो, आपल्या मनात आहे तेच .. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई आणि बंगालमधील भुवनेश्वरी देवींच्या पोटी जन्माला आलेले नरेंद्र दत्त .. अर्थात ज्यांनी पारतंत्र्याच्या काळात आपल्या उण्यापुऱ्या चाळीस वर्षाच्या आयुष्यात हिंदू धर्म साऱ्या जगाला समजावून सांगितला ते स्वामी विवेकानंद !!!
जिजाबाईंचा काळ लक्षात घेतला तर सुलतानी आणि अस्मानी संकटाचा. जिथे जिजाबाईंच्या जाऊबाईंना (सरदार शहाजीराजांच्या वहिनीला) गोदावरीच्या घाटावरून मुसलमान सरदारांनी पळवून नेली होती, तिथे सामान्य मनुष्याची आणि त्या काळातील आयाबहिणींची अवस्था काय असेल याची कल्पना केली तरी आपल्या अंगावर काटा उभा राहतो. “मोगलाई आहे का ?” असा प्रश्न जिथे दमनशाही होते, तिथे विचारला जातो. पण त्याकाळापासून हा शब्द प्रचलित आहे म्हणजे त्या शब्दाची दाहकता त्यावेळेला किती असेल, याची आपण कल्पनाच केलेली बरी. आजच्या पिढीला ‘मोगलाई’ या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर त्यांना बाराव्या शतकापासूनचा इतिहास अभ्यासावा लागेल.
संत ज्ञानेश्वरांपासून भागवत धर्माची, म्हणजेच भक्तिमार्गाची मुहूर्तमेढ पुन्हा रोवली गेली… ..
…. “ज्ञानदेवें रचिला पाया, तुका झालासे कळस।”
सात्विक शक्तीचे बीज संवर्धन करण्याचे काम एका अर्थाने बाराव्या शतकापासून सुरु झाले. त्या काळातील संतांनी राजकीय सुधारणांच्या मागे न लागता व्यक्तिगत साधना (पारमार्थिक), शुचिता, भक्तिमार्गातून समाजाचे संघटन, किर्तनाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन, कुरुढींचे उच्चाटन करण्याचे महत्त्वाचे कार्य केले… .. त्या काळात ‘शंभर वेळा थुंकणाऱ्या यवनाला प्रतिकार न करता तुझ्यामुळे मला शंभरवेळा गोदावरीचे स्नान घडले’ असे म्हणणारे शांतीब्रम्ह एकनाथ महाराज त्या काळात होऊन गेले ..
तसे ” नाठाळाच्या माथी हाणू काठी” म्हणणारे संत तुकाराम देखील झाले.
तसेच “शक्तीने मिळती राज्ये, शक्ती नसता विपन्नता” असे म्हणणारे समर्थ रामदास सुद्धा समकालीन संत होत… .. शांतीब्रह्म एकनाथ महाराज त्यावेळेस प्रतिकार करु शकत नसतील असे वाटत नाही, पण त्या काळातील संतांचे चरित्र बघितले तर प्रत्येकाचे जीवन हे त्यावेळेच्या समाजपुरुषाचे प्रतिबिंब दाखविणारे होते. संत एकनाथांच्या काळात एका अर्थाने निद्रिस्त असलेल्या हिंदू समाजाचा स्वाभिमान संत तुकारामया आणि समर्थ रामदासांच्या काळात थोडा अधिक जागृत झालेला होता असे म्हटले तर वावगे होणार नाही. या सर्व संतांच्या मांदियाळीचे आपल्यावर अनंत उपकार आहेत आणि म्हणूनच आपण आज हिंदू म्हणून अभिमानाने जगत आहोत.
नारळाचे रोप कोंब फुटून वरती यावयास सहा महिने लागतात, त्यांनंतर ते रोप जमिनीत लावले तर नारळ (फळ) यावयास सामान्यपणे दहा वर्षे लागतात. इथे तर सामान्य मनुष्य अतोनात हालआपेष्टा सहन करीत जीव मुठीत धरून जगत होता. ‘स्वाभिमान’ नावाचा एखादा गुण असतो, हे सामान्य मनुष्याच्या ध्यानीमनीही नव्हते. अशा निद्रिस्त मनात भक्तिमार्गाच्या सहाय्याने संतमंडळींनी स्वत्वाचे, सात्विकतेचे बीज आधी पेरले, रुजवले आणि मग विकसित केले आणि याचे मूर्तीमंत, तेज:पुंज उदाहरण म्हणजे श्रीमानयोगी छत्रपती शिवाजी महाराज !!!
अंगी पराक्रम असताना आपले सरदार जहागिरी आणि वतनासाठी आपल्याच भाऊबंदाना छळत होते आणि परक्या मोगलांची चाकरी करीत होते. या सर्वाला प्रतिकार करणारा कोणी तरी सुपुत्र तयार करावयास हवा. जिजाबाईंनी ही सर्व परिस्थिती अभ्यासली आणि आपल्या मनाशी पक्की खूणगाठ बांधली. हिंदूंचे स्वतःचे सिंहासन असावे, हिंदू राजा होऊ शकतो हे साऱ्या भरतवर्षाला कळावे असा संकल्प जिजाबाईंनी केला आणि ‘याची देहि याचीडोळा’ सत्यात उतरवला. जरी तो काळ मोगलाईचा होता तरी आपला पूर्व इतिहास हा विजयाचाच होता. त्यांनी विजयाचा इतिहास आपल्या मुलाला शिकविला. रामाने पत्नीला पळवणाऱ्या रावणाला वानरांची सेना संघठीत करून स्वसामर्थ्याने युद्धात मारले, अर्जुनाने युद्ध करून आपले धर्माचे राज्य मिळविले, हे शिकविले. कोणतीही गोष्ट किमान दोन वेळा तरी नक्की घडते. त्या प्रमाणे जिजाबाईनी ‘शिवाजी’*ला प्रथम आपल्या मनात जन्मास घातले आणि त्याप्रमाणे आपल्या मुलास घडविले. एक *’आई*ने मनात ठरवले तर काय करु शकते ते छत्रपतींकडे बघितले की लक्षात येते. अफजल खानाच्या भेटीच्या वेळेस “मेलास तरी चालेल पण शत्रूला मारल्याशिवाय परत येऊ नकोस” असे म्हणणारं आईचे मन किती कर्तव्यनिष्ठुर असेल. माझ्या अनुमानाप्रमाणे त्याकाळात प्रत्येक घरात एकतरी ‘जिजाऊ’ नक्की असेल. कारण ज्याप्रमाणे वर्गात एकाचाच प्रथम क्रमांक येतो, त्याप्रमाणे *एकच शिवाजी झाला आणि बाकीचे त्यावेळेच्या गरजेनुसार कोणी सरदार झाले तर कोणी मावळे झाले. शिवाजी महाराजांसाठी मरायला तयार होणारे मावळे हे अर्धपोटीच होते, पण त्याच्या माता ह्या जिजाबाईंप्रमाणे शूर होत्या, म्हणून त्यांना आपल्या मुलाच्या ‘करिअर’ची चिंता नव्हती. हिंदवी स्वराज व्हावे ही जशी श्रींची इच्छा होती तशी ती सामान्य मनुष्याची देखील होती. आणि ही ‘ईच्छा’ सामान्य मनुष्याच्या अंतरात प्रकट करण्याचे श्रेय निश्चितच जिजाबाईंना द्यावे लागेल. आणि म्हणूनच त्या काळातील सामान्य आई देखील स्वराज्य हेच मुलाचे ‘करिअर’ मानू लागली. आणि जिजाबाईंप्रमाणे ती देखील लेकराला स्वराज्यासाठी खुशाल बलिदान दे आणि घाबरुन पळून आलास तर मला तोंड देखील दाखवू नकोस असे ठणकावून सांगू लागली.
आजची परिस्थिती फार वेगळी आहे अशातला भाग नाही. फक्त आक्रमकांचे मुखवटे आणि स्वरुप बदलले आहे. सर्वांचे ध्येय एकच आहे ते म्हणजे हिंदुस्तानचा, हिंदूधर्माचा नाश. आज ‘आई’ होणे हे ‘चूल आणि मूल’*ह्या चौकटीत अडकणे, अशा पद्धतीने समाजात प्रस्तुत केले जात आहे. खरंतर ‘आई’ होणे हा प्रत्येक स्त्रीचा निसर्गदत्त विशेषाधिकार आहे. स्त्री जातीचा *’आई’ असणे हा खूप मोठा गौरव आहे. स्त्रीच्या अर्धनग्न देहाचा विविध उत्पादनांच्या जाहिरातीसाठी उपयोग करणाऱ्या तथाकथित पुढारलेल्या समाजाला मुलींनी ‘आई’ व्हावं, आईपण आयुष्यभर निभवावे, चूल आणि मूल सांभाळावे हे मागासलेपणाचे निदर्शक वाटते. याला काय म्हणावे ? स्त्रीच्या कर्तृत्वाबद्दल निदान भारतात तरी कोणी संशय घेऊ नये. कारण ती यमावर विजय मिळवणारी ‘सावित्री’ झाली , ती ‘गार्गी’ झाली, ती ‘मैत्रेयी’ झाली, ती ‘झाशीची राणी’ झाली, ती ‘अहिल्याबाई होळकर’ झाली, ती ‘अरुणा असफली’ झाली, ती ‘इंदिरा गांधी’ झाली. ती काय झाली नाही असे नाहीच. पण ती चूल आणि मूल यातच अडकली होती किंवा अडकवली गेली होती असे म्हणणे मात्र फार मोठी शोकांतिका आहे. आपल्याकडे कर्तृत्ववान स्त्रियांची महान परंपरा आहेच. पण त्यापेक्षा मोठी परंपरा आपल्याकडे जिजाबाईंसारख्या मातांची आहे. स्वामी विवेकानंदांची आई, सरदार भगत सिघांची माता, स्वा. सावरकरांची आई, चाफेकर बंधूंची आई, सर्व क्रांतीकारकांच्या माता, डॉ. रघुनाथ माशेलकराची आई, थोडक्यात सर्व महान पुरुषांच्या माता. कारण चांगल्या प्रतीच्या झाडासच रसाळ आणि मधुर फळे येतात. इकडे शिवजयंतीला महाराज !! तुम्ही परत या, असं म्हणायचं ? आणि दुसरीकडे स्त्रीभ्रूणहत्या करायची, स्त्रियांवर, लहान लहान मुलींवर अत्याचार करायचे, असं आता चालणार नाही. समजा छत्रपती शिवाजी महाराज प्रसन्न झाले आणि मी जन्म घेतो असे म्हणाले तर आपल्याकडे जिजाबाई कुठे तयार आहेत?
आजच्या शुभदिनी आपण सर्वांनी आपल्या घरात, परिवारात ‘जिजाबाई’ कशा घडवता येतील असा संकल्प करुया. मग शिवाजी महाराज आणि मावळे नक्कीच जन्माला येतील यात शंका नाही.
राष्ट्रमाता जिजाबाई यांच्या चरणी माझे साष्टांग दंडवत…