मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ त्याचं असं झालं… भाग-२- लेखक – डॉ. श्रीनिवास नाटेकर ☆ परिचय – डॉ. संदीप श्रोत्री ☆

डॉ. संदीप श्रोत्री

? इंद्रधनुष्य ?

 ☆ त्याचं असं झालं… भाग-२ – लेखक – डॉ. श्रीनिवास नाटेकर ☆ परिचय – डॉ. संदीप श्रोत्री ☆

(एक आगळ्या वेगळ्या पुस्तकाचा आगळा वेगळा परिचय)  

पुस्तक : त्या चं असं झालं

लेखक : डॉ. श्रीनिवास नाटेकर   

प्रकाशक : चतुरंग प्रकाशन 

पृष्ठ : 264 

किंमत :  रु. 200

त्याचं असं झालं,.. गप्पा रंगात आल्या होत्या, आम्ही तिघेजण होतो, समोरच्या व्यक्तीला मी म्हणले, ‘अण्णा, आमच्या डॉक्टरी व्यवसायात आम्हाला देखील खुपसे रांगडे अनुभव येतात, पण फारच थोडी डॉक्टर मंडळी ते शब्दबद्ध करतात, असे का बरे?’ अण्णा म्हणाले, आता मी गप्प बसतो, तुझ्याकडे आहे अशा अनुभवांचे गाठोडे, तू सांग तुझे अनुभव! पुढील तासभर मी बोलत होतो, अण्णा ऐकत होते, शांतपणे डोळे मिटून. त्या दोघांपैकी एक होता माझा नूमवी (ओउने) शाळेतील माझा जिगरी दोस्त गजानन सरपोतदार आणि दुसरे होते गजानन दिगंबर माडगुळकर अर्थात गदिमा!

त्याचं असं झालं,.. सांगलीमधील रक्तपेढीचा कार्यक्रम होता, त्यासाठी पाहुणे गाडीने येताना प्रवासात गाडीमधील एसी चालू होता, काचा बंद होत्या, अचानक काळा धूर येऊ लागला आणि आतमधील सर्वजण गुदमरू लागले. कशीबशी गाडी येऊन सांगलीत पोहोचली, तोपर्यंत सर्वजण उलटी, चक्कर आणि डोकेदुखीने त्रस्त झाले होते. मी जातीने उपचारात लक्ष घातले, रक्तपेढीचा कार्यक्रम संध्याकाळी सुरु झाला, बोलताना पाहुणे उभे राहिले, ‘खरे म्हणजे आम्ही स्वर्गाचे दार ठोठावले होते, दार उघडले नाही म्हणून परत आलो, रक्तदान करायच्या अगोदर देहदान करायची वेळ आली होती!’ श्रोत्याना ती एक शाब्दिक कोटी वाटली, पण मला ते कारण माहिती होते. ते पाहुणे होतेअर्थातच, भाई उर्फ पु लं देशपांडे!

त्याचं असं झालं,.. सांगलीमध्ये एक क्रिकेट मॅचसाठी महान क्रिकेटपटू आलेले होते. सकाळी रत्ना इंटरनॅशनल हॉटेलमधून फोन आला, मी गेलो, खोलीमध्ये तापाने फणफणलेला एक रुग्ण, त्याला तातडीने मुंबईला हलवायला पाहिजे होते. तत्काळ थेट (तत्कालीन) मुख्यमंत्री वसंतदादा पाटील ह्यांना फोन करून विचारले, कारण ते आणि त्यांचे विमान सांगलीमध्ये होते, त्याच विमानातून त्या रुग्णाची सोय मुंबईमध्ये जाण्यासाठी केली, तो रुग्ण होता साक्षात सुनील गावस्कर! 

त्याचं असं झालं,.. आम्ही दिल्लीला जाताना वाटेत भोपाळ स्टेशनवर थांबलो. स्टेशनवरील मध्यप्रदेश डेअरीच्या स्टॉलवर थंड दुधाची बाटली मिळते, ती आणायला मी उतरलो, समोर झब्बा, लेंगा उपरणे घातलेले एक गृहस्थ, मी ओळखले पटकन नमस्कार केला. नंतर त्यांनी जे सांगितले त्यामुळे मी गहिवरलो. ते म्हणाले, ’कालच रामचा फोन आला होता, तुम्ही याच रेल्वेने दिल्लीला चालला आहात, माझी गाडी दुसर्या प्लॅटफॉर्मवरून थोड्या वेळाने निघणार आहे, म्हणून तुम्हाला भेटायला आणि हा मिठाईचा पुडा घेऊन आलो आहे!’ अशी ती व्यक्ती होती पद्मविभूषण पंडित कुमार गंधर्व! 

त्याचं असं झालं,.. एकदा गाडीने मुंबईहून सांगलीला जात असताना चहा, नाष्टासाठी साताऱ्यात हॉटेल रजताद्रीमध्येन जाता शनिवार पेठेतील माझ्या मित्राच्या घरी गेलो. तो ओपीडीमध्ये होता, त्याने घरी शिरा-भजी-चहा करायला सांगितला आणि समोरच्या टेबलाखाली ठेवलेले चार-पाच एक्सरे काढले. प्रत्येक एक्सरे ठराविक दिवसांनी घेतलेला होता, मी एक्सरे तज्ञ असल्यामुळे त्याने मला दाखविले. सर्व काळजीपूर्वक बघितल्यावर मी फुफ्फुसाचा कर्करोग असल्याचे निदान केले. तो टीबी नसून कर्करोग होता. स्वतः एम डी डॉक्टर असणारा तो मित्र म्हणाला, अगदी बरोबर, मलाही तेच वाटत आहे. तू कॅन्फर्म केलेस. चहा-नाष्टा झाल्यावर मी सहज म्हणालो, कुणाचे एक्स रे आहेत रे ते?, त्यावर तो अतिशय शांतपणे म्हणाला, ‘माझेच!’ मी सुन्न! काही दिवसांचा सोबती असणारा तो प्रथितयश फिजिशियन म्हणजे सातारा शहरातील आजच्या जीवनज्योत रुग्णालयाचे एक संस्थापक, कै डॉ बाबा श्रीखंडे ! 

त्याचं असं झालं…

त्याचं असं झालं…

त्याचं असं झालं…

त्याचं असं झालं…

…… ही यादी त्याच्या आयुष्यात न संपणारी आहे.

आपसुकच मनामध्ये प्रश्न येतो की त्याचं ‘असं’ कसं झालं? आणि…

त्याचंच कसं झालं? हे रहस्य ओळखण्यासाठी आपण हे “ त्याचं असं झालं “ पुस्तक वाचले पाहिजे.

हा लेखक आहे, सांगलीमधील प्रख्यात रेडिऑलॉजीस्ट आणि माझे शिक्षक डॉ. श्रीनिवास नाटेकर.

पुस्तकाचे नाव – त्याचं असं झालं 

लेखक – डॉ श्रीनिवास नाटेकर 

प्रकाशन – चतुरंग

किंमत – रु २००/- 

हे पुस्तक वाचताना आपण विस्मयचकित होतो, की, एखाद्याच्या कुंडलीमध्ये विधाता काय काय ‘योगायोग’ भरून ठेवतो ?

कधी ती व्यक्ती दीर्घायुषी असते तर कधी अल्पायुषी, जन्माच्या स्टेशनवर आपण मृत्यूचे तिकीट घेऊन चढलेलो असतो. आपले उतरायचे स्टेशन कुठे येणार, कधी येणार हे आपल्याला माहीत नसते, काळाची ही रेल्वेगाडी चालूच असते, एकाच गतीने जात असते. आपण त्यामध्ये नुसतं बसून राहायचं की शेजारच्या सहप्रवाशांची गप्पा मारायच्या किंवा आणि काय लेखन, कला, साहित्य, चित्र काढत बसायचं हे आपलं आपण ठरवायचं असतं.

८५ वर्षाच्या या प्रवासामध्ये डॉ. नाटेकर सरांना वाटेत अनेक प्रवासी मित्रमैत्रिणी भेटले. काही वेळ भेटले, आपापल्या स्टेशनवर उतरून निघून गेले, पण त्यामध्ये होते ते प्रथितयश कवी, लेखक, हिंदी – मराठी सिनेसंगीतातील गायक, संगीतकार, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू, प्रख्यात उद्योजक, लोकप्रिय राजकारणी, आणखी किती नावे सांगू? ही यादी न संपणारी !

हे केवळ नशीब आहे.. का ही केवळ नियती आहे.. की योगायोग?

लेखक म्हणतात, “ परमेश्वराची कृपा असावी. “ परंतु मला असं वाटतं की ही लेखकाची एक तपश्चर्या असावी, समोरच्या व्यक्तीला न दुखवता त्याच्या हृदयामध्ये स्थान मिळवण्याची हातोटी असावी, लेखकाची ती एक कला असावी. आपणही अशा अनेक उत्तुंग व्यक्तीमत्वांच्या संपर्कात येत असतोच, परंतु आपल्याला ही कला नाही, म्हणून मला असे वाटते, की जर आपले चरित्र लिहायला घेतले तर त्याचे नाव द्यावे लागेल.. ‘ माझं हसं झालं ! ’

या पुस्तकात अशा अनंत आठवणी आहेत. मी स्वतः १९८२ ते १९९१ ह्या काळामध्ये मिरज वैद्यकीय महाविद्यालयात आणि सिव्हील हॉस्पिटल सांगली इथे होतो. त्या काळात आमच्या स्पोर्ट आणि एक्सरे पुरताच नाटेकर सरांशी संबंध आला. सरांनी घेतलेली एकनाथ सोलकर यांची मुलाखत आजही आठवते. प्रसिद्ध बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर हे सरांचे भाऊ. ह्या नाटेकरबंधूंचे बालपण पुणे, मुंबई येथे गेले. जात्याच अभ्यास आणि खेळात हुशार. शास्त्रीय संगीत, भावगीते, सिनेसंगीत आवडीचे. क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस आदि क्षेत्रामध्ये ह्या बंधूंचा खूप बोलबाला होता, त्यामुळे त्यांची उठबस होती ती अतिशय उच्चभ्रू वर्गात… त्या ह्या आठवणी !

या पुस्तकाचे हेच वैशिष्ट्य आहे की याला अनुक्रमणिका नसली तरी चालते. कोणतेही पान केव्हाही उघडावं आणि वाचत बसावे.. वाचव असता हसावं, चकित व्हावं. मी तर सांगितली ही नुसती झलक. हे पुस्तक सध्या छापील स्वरुपात विक्रीस उपलब्ध नाही. परंतु किंडल किंवा ई बुक उपलब्ध आहे.

डॉ नाटेकर सरांचा whats app नंबर मुद्दाम देत आहे. (8055771552) त्यांनाही आपला अभिप्राय जरूर कळवावा.

डॉ. श्रीनिवास नाटेकर यांचे हे पुस्तक – “ त्याचं असं झालं…” विकिमिडिया कॉमन्सवर सर्वांसाठी मुक्त उपलब्ध झाले आहे. ( https://w. wiki/4chA ) 

– समाप्त – 

© डॉ. संदीप गजानन श्रोत्री

(सरांचा एक विद्यार्थी )

सातारा 

मो 9822058583

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ त्याचं असं झालं… भाग-१- लेखक – डॉ. श्रीनिवास नाटेकर ☆ परिचय – डॉ. संदीप श्रोत्री ☆

डॉ. संदीप श्रोत्री

परिचय

शिक्षण – MBBS.MS. FIAGES. (लॅप्रास्कोपी व जी आय एंडोस्कोपी सर्जन.सातारा.)

फाउंडर सेक्रेटरी, सातारा सर्जिकल सोसायटी, फाउंडर सेक्रेटरी,असोसिएशन ऑफ हाॅस्पिटल ओनर्स, वैद्यकीय क्षेत्रातील अनेक संस्थांचे पदाधिकारी. तसेच या क्षेत्रातून सामाजिक सेवेचे उपक्रम यशस्वी रित्या राबवले आहेत.

कार्य व सन्मान:

  • संस्थापक, रानवाटा निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन मंडळ, सातारा
  • दुर्ग साहित्य संमेलनांचे आयोजन व सक्रीय सहभाग
  • वन्य लोकसंस्कृती व जैव विविधता यांच्या संवर्धनासाठी अनेक प्रकारे जनजागृती
  • डोंगर पठारावरील वनस्पतीत व पक्षी यांचा विशेष अभ्यास
  • हिमालय ट्रेकिंग मोहिम… सहभाग व लेखन
  • पक्षीनिरीक्षण, आकाशदर्शन, वृक्षारोपण, जलसंधारण यावर व्याख्याने,स्लाईड शो, वृत्तपत्रीय लेखन
  • वसंत व्याख्यानमाला, पुणे
  • निमंत्रित विख्यात :  इंडिया क्लब, दुबई येथे मराठी राजभाषा दिनानिमित्त व्याख्यान… “माझी भटकंती” इत्यादी
  • अध्यक्ष, तिसरे ‘ शिवार ‘ साहित्य संमेलन. इत्यादी

पुरस्कार

वसुंधरा पर्यावरण पुरस्कार, किर्लोस्कर वसुंधरा सन्मान, कोयना निसर्ग मित्र पुरस्कार, द. महाराष्ट्र साहित्य पुरस्कार, मुंबई मराठी प्रवासी संघटना पुरस्कार, गिरिमित्र सन्मान पुरस्कार, आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी(कासवाचे बेट),  वसुंधरा रत्न राज्यस्तरीय पुरस्कार (कासवाचे बेट),  श्री स्थानक ठाणे मराठी ग्रंथालय पुरस्कार (उत्कृष्ट प्रवास वर्णन), धन्वंतरी पुरस्कार, महाराष्ट्र. राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ यांचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार (कासवाचे बेट)

प्रकाशित साहित्य

एव्हरेस्टच्या पायथ्याशी, पुष्पपठार कास, मार्क इंग्लिस, साद अन्नपूर्णेची, काटेरी केनियाची मुलायम सफर, दुर्ग महाराष्ट्रातील, कासवांचे बेट, मनू राष्ट्रीय अरण्य, इंकांची देवनगरी, रहस्यमय पेरु, निसर्ग गुपिते भाग १, सातशे पेक्षा जास्त लेखांचे विविध माध्यमातून प्रकाशन

? इंद्रधनुष्य ?

☆ त्याचं असं झालं… भाग-१ – लेखक – डॉ. श्रीनिवास नाटेकर ☆ परिचय – डॉ. संदीप श्रोत्री ☆

(एक आगळ्या वेगळ्या पुस्तकाचा आगळा वेगळा परिचय)  

पुस्तक : त्या चं असं झालं

लेखक : डॉ. श्रीनिवास नाटेकर   

प्रकाशक : चतुरंग प्रकाशन 

पृष्ठ : 264 

किंमत :  रु. 150

त्याचं असं झालं, .. मी एकदा दुपारी सांगली मधील क्लिनिकमध्ये बसलो होतो, मला मिरज येथील प्रसिद्ध कान नाक घसा तज्ञ डॉ डी के गोसावी यांच्याकडून फक्त ‘एक व्ही आय पी रुग्ण’ येणार आहे, इतकेच माहिती होते, आणि त्या मागील दराने आत येतील. बरोबर साडे तीन वाजता मागील दारात एक गाडी थांबली, गाडीतून पांढरीशुभ्र साडी नेसलेली एक शालीन, डोक्यावरून पदर घेतलेली, नम्र स्त्री उतरली, तिने तिच्या जगप्रसिद्ध खळाळत्या हास्यमय आवाजात सांगितले, ‘नमस्कार डॉक्टर साहेब, माझाच छातीचा एक्स रे काढायचा आहे!’ अंदाजे तासभर ती माझ्या क्लिनिक मध्ये होती. एकूण आठ एक्सरे मला काढायला लागले. त्या दरम्यान माझ्या गाण्याच्या आवडीमुळे आमच्या गप्पा चांगल्या रंगल्या, इतक्या कि ‘सैंया’ चित्रपटातील ‘काली काली रात रे, बडा सताये, तेरी याद में..’ हे गाणे आठवून आम्ही दोघांनी मिळून एकसुरात गुणगुणलो! ती होती गान कोकिळा, स्वरशारदा लता मंगेशकर !

त्याचं असं झालं, .. दुपारी डॉ डी के गोसावी यांचा फोन आला, त्यांच्या मिरज येथील फार्म हाउस वर गप्पा मारायला संध्याकाळी बोलावले होते. मी वेळेवर गेलो, टेबलावर स्कॉच आणि तीन ग्लास ठेवलेले होते, एक अस्ताव्यस्त केस वाढवलेला गोरापान लहान चणीचा माणूस बसला होता. डॉक्टरांनी ओळख करून दिली, हे कविवर्य बा भ बोरकर!

त्याचं असं झालं, .. ती व्यक्ती दोन वेळा माझ्या घरी राहिली होती, तोंडात पान सतत असल्यामुळे ओठाचा चंबू, चणीने लहान, बुटके, गोल चेहरा, गोबरे गाल. त्यांचा एक्स रे छातीचा मी बघितला आणि म्हणले, ‘एक फुफ्फुस अर्ध्यापेक्षा जास्त निकामी, दुसरे देखील हवेचे फुगे झाल्यामुळे (एम्फिझिमा) लवकरच कामातून बाद होणार! तरिही ते गात होते, तासंतास! त्यांचे नाव पंडित कुमार गंधर्व ! 

त्याचं असं झालं, .. मिरज रेल्वे स्टेशनवर मित्राला सोडायला गेलो होतो, खूप गर्दीमध्ये पाठीवर थाप पडली, मागे वळून बघितले तर दोन मित्र होते, त्यांना मुंबईला जायचे होते. इथे रेल्वे बदलावी लागायची, महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये त्यांना जागा मिळत नव्हती. रिझर्वेशन केले नव्हते, अगदी काकुळतीला येऊन त्यांनी मदतीसाठी विचारले. त्याचवेळी माझा मित्र असलेला आमदार विक्रम घाटगे भेटला, त्यांने दोन बर्थ मिळवून दिले, त्या दोघांपैकी एक होता माझा खास मित्र मुकुंद जोशी आणि दुसरा होता आमचा मित्र सुनील गावस्कर!

त्याचं असं झालं, ..  एकदा सांगली सिव्हील हॉस्पिटलसाठी एकस रे मशीन खरेदी करण्यासाठी मुंबईमध्ये गेलो होतो, कामे आटोपून सचिवालयाजवळ फिरत असताना समोर स्टेट बँकेची इमारत होती, नुकताच आपल्या क्रिकेट टीमने इंग्लंडमध्ये जाऊन त्यांच्यावर विजय मिळविला होता. सहज म्हणून वर गेलो. केबिनबाहेरील सेक्रेटरीकडे ‘ओल्ड फ्रेंड’ म्हणले आणि स्वतःचे नाव न लिहिता चिठ्ठी दिली, आतून ती व्यक्ती स्वतः बाहेर आली, दार उघडल्याक्षणी मला मिठी मारून विचारले, ‘काय श्री, काय म्हणतोस?’ ती व्यक्ती होती, भारताचा यशस्वी कर्णधार अजित वाडेकर ! 

त्याचं असं झालं, .. सांगलीच्या पोलीस सांस्कृतिक भवनाच्या हॉलमध्ये माडीवर व्हरांड्यात मोडकळीस आलेल्या दोन खुर्च्या हाताने साफ करून दोन व्यक्ती बसल्या होत्या, एका पोलिसाने आणलेल्या मळकट किटलीमधून दोन कप चहाचे भरले, ते कप देखील कळकट आणि टवके उडालेले होते, चहा आणि बिस्कीट खात गप्पा मारत बसलेल्या त्या दोन व्यक्तिपैकी एक म्हणजे मी होतो, आणि दुसरी व्यक्ती होती भारताचे माजी  पंतप्रधान चौधरी चरणसिंग!

त्याचं असं झालं, ..  एकदा सकाळी माझे मित्र माधवराव आपटे यांचा फोन आला, लगेच विलिंग्डन क्लब वर ये, आम्ही तिघे आहोत, चौथा पार्टनर हवा आहे. मी गेलो. हातात रॅकेट, पायात महागडे बूट घालून माझी वाट पाहणारे ते होते प्रसिद्ध उद्योगपती  श्री आदित्य बिर्ला! 

त्याचं असं झालं, ..  सांगलीमध्ये एकदा १९९४ साली प्रभाताई कुलकर्णी यांच्या एका कारखान्याचा उद्घाटन समारंभ होता. सूत्रसंचालन मी करणार होतो, माझ्या इंग्रजी संभाषण कलेमुळे कारखाना दाखवण्याची जबाबदारी देखील माझीच होती. पाहुणे आले. समारंभ छान पार पडला, शेवटी पाहुण्यांनी माझी ओळख झाल्यावर एकाच वाक्य म्हणले, ‘नेव्हर इमाजिंन्ड यु आर अ मेडिकल डॉक्टर!’ ती व्यक्ती होती,  श्री रतन टाटा!

त्याचं असं झालं, ..  घरीच संध्याकाळी गप्पा रंगात आल्या होत्या, समोरची व्यक्ती सांगत होती, ‘आमच्या वाटेला हिरॉईन कधी येत नाही, येतात त्या मर्कटचेष्टा करणाऱ्या बारबाला, स्कॉच बाटलीमधील कोरा काळा कडू चहा आम्हाला प्यावा लागतो आणि झिंगावे लागते खोटे खोटे ! आम्ही पडलो व्हिलन, आमच्या गोळीबारात कधी कुणी मारत नाही, उलट हिरोच्या मात्र प्रत्येक गोळीने एकेक मुडदा पडतो.’ ती व्यक्ती होती सदाशिव अमरापूरकर!

त्याचं असं झालं, ..  माझा मित्र डॉ आडिगा याचा फोन आला, आज रात्री साडेसात वाजता घरी जेवायला यायचे आहे. मी सात वाजून सत्तावीस मिनिटांनी पोहोचलो. तिसर्या मजल्यावरील खोलीत तीन खुर्च्या होत्या, टेबलावर ‘जॉनी वॉकर’ होती, समोरच्या खुर्चीत एक वृद्ध सद्गृहस्थ बसले होते, गोरेपान, तुळतुळीत टक्कल, भुरभुरणारे किरकोळ पांढरे केस, सोनेरी काडीचा चष्मा, झब्बा आणि त्यावर असणारी सोनेरी बटणे.  ते होते ओंकारप्रसाद उर्फ ओ पी नय्यर! 

त्याचं असं झालं, ..  घरी ‘काका’ आले होते, गप्पांना सुरुवात होणार, तितक्यात लेदर बॅगमध्ये हात घालता घालता काका म्हणाले, ‘चला संध्येची वेळ झाली’, मी म्हणले, ‘काका तुम्ही माझ्या घरी आहात, तेंव्हा व्हिस्की माझी!’  गप्पा रंगात येत असताना मध्येच काका ओरडून माझ्या बायकोला सांगतात, ‘सुधाताई, आमचं अमृतप्राशन झाल ग, आता वाढ!’ मला वाटले, काका स्वतःच्या कवितेतील अनुभूती आणि त्यांचा जन्म उलगडून सांगत होते, त्यावेळी त्या ग्लासमध्ये जे काही असते, ती दारू नसतीच, ते असते अमृत! आणि काका म्हणजे साक्षात कविवर्य ‘मंगेश पाडगावकर’!

त्याचं असं झालं, ..  बंगल्याच्या दारात एक मर्सिडीज गाडी उभी होती, पांढरीशुभ्र लुंगी आणि नुकतीच अंघोळ केलेला उघडाबंब तुकतुकीत देह सांभाळत ती व्यक्ती मनापासून गाडी धूत आणि पुसत बसली होती. मीही त्यांच्याबरोबर हातात फडके घेतले आणि ती गाडी पुसायला लागलो. सकाळची वेळ, त्या वेळी दूरदर्शनवर रामायण मालिका सुरु होती. आमच्या घरात आणि आसपासच्या बंगल्यातदेखील त्याचा आवाज मोठा असल्यामुळे आमच्यापर्यंत येत होता. रविंद्र जैन यांचे संगीत रामायण मालिकेमध्ये भरपूर आहे. विविध प्रसंगात विविध रागांचा वापर केल्यामुळे मालिकेमध्ये रंगत आली आहे. तिकडे तो राग ऐकला कि गाडी धुता धुता इकडे ती व्यक्ती त्या रागांचे विस्तारण करून, विडंबन करत गंमतजमत करून गात होती. तिकडे रामायण संपले, इकडे गाडी स्वच्छ धुवून झाली, मी ऐकत होतो आणि गाणारी व्यक्ती होती, ‘पंडित भीमसेन जोशी !’ 

  – क्रमशः भाग पहिला 

© डॉ. संदीप गजानन श्रोत्री,

सातारा 

मो 9822058583

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अलेक… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ अलेक… ☆ श्री सुनील शिरवाडकर

अलेक पद्मसी

त्या दिवशी ‘लिंटास’ मध्ये मिटींग होती. ‘युनीलिव्हर’ चं एक प्रॉडक्ट ‘रिन डिटर्जंट बार’ भारतामध्ये लॉंच करायचं होतं. तसं हे प्रॉडक्ट इतर देशात फेल गेलेलं.. ‘लिव्हर्स’ चा आग्रह होता की जाहिराती मध्ये ‘हा बार स्वस्त आहे’ यावर भर द्यावा पण अलेक आणि त्याच्या टिमचं म्हणणं.. शुभ्रतेवर भर द्यावा.

बऱ्याच चर्चेनंतर अखेर भर शुभ्रतेवरच द्यावा हे म्हणणं मान्य झालं. आणि मग अलेक पद्मसी आणि त्याच्या सहकार्यांनी ‘ती’ जाहिरात बनवली आसमंतातुन येणारा विजेचा झोत.. आणि मग त्यामागे येणारे शब्द..

Whitening strikes again and again with RIN

आणि मग त्यानंतर इतिहास घडला. रिन आणि भारताचे अतूट नाते निर्माण झाले. रिनच्या विक्रीचे आकडे छप्पर फाडून वर गेले.

अगदी याउलट झाले ते काहीवर्षांनंतर. ‘निरमा’ पावडरचा खप प्रचंड वाढला होता. ‘सर्फ’ ची विक्री खूपच घसरलेली. ‘सर्फ’ साठी नवीन जाहिरात बनवायची होती. पुन्हा एकदा अलेक पदमसी आणि त्याची टीम कामाला लागली. यावेळी ‘लिव्हर्स’ चं म्हणणं जाहीरातीत शुभ्रतेवर भर द्यावा. वास्तविक ‘निरमा’ च्या तुलनेत ‘सर्फ’ खूपच महाग होता. यावेळी अलेकचं म्हणणं वेगळं होतं. अर्धा किलो सर्फ एक किलो निरमाच्या बरोबरीचा आहे हे त्याला गिऱ्हाईकांना पटवून द्यायचं होतं. अंतिमतः सर्फच घेणं फायदेशीर कसं आहे हे दाखवण्यासाठी त्याने एक भारतीय गृहिणी उभी केली.. ‘ललिताजी’ तिचं नाव. वेगवेगळ्या जाहिरातीतुन ललिताजी मग पटवुन देऊ लागली…

” भाई साब, सस्ती चीज और अच्छी चीज में फर्क होता है”… ती प्रत्येक गोष्ट विचार करुनच खरेदी करते.. आणि शेवटी म्हणते..

 “ सर्फ की खरीददारी में ही समझदारी है “

आणि मग तिथुन सर्फने पुन्हा एकदा मोठी झेप घेतली.

अश्या अनेक जाहिरातींमागे अलेकचं कल्पक डोकं होतं. मग ‘चेरी ब्लॉसम’ चा चार्ली असो.. की धबधब्याखाली आंघोळ करणारी ‘लिरील गर्ल’ असो.. ‘कामसुत्र’ची पूजा बेदी असो की ‘एमआरएफ’ चा मसलमॅन… अलेक पद्मसीने भारतीय समाजमन अचुक जाणलं होतं. प्रत्येक जाहिरात तो विचारपूर्वक बनवायचा.

अलेक पद्मसी.. एक खरा भारतीय. दक्षिण मुंबईत कुलाबा कॉजवेवर त्यांची अलिशान हवेली होती. वडिलांचा काचेचा व्यवसाय. घरात पाश्चात्य वळण.. पाश्चिमात्य वस्तूंची रेलचेल.. हंड्या.. झुंबरं.. भव्य पेंटिंग्ज.. इटालियन फर्निचर.. रविवारी सगळं कुटुंब ‘मेट्रो’ ला जायचं…. इंग्लिश फिल्मस् पहायला.

पण अलेक आणि त्याच्या भावंडांना मात्र नाटकाचं वेड. रात्र रात्र त्यांच्या दिवाणखान्यात तालमी चालायच्या. आणि मग त्यातुनच अलेकमधला अभिनेता घडत गेला.

रिचर्ड अँटनबरो ‘गांधी’ बनवत होते. महंमद अली जिनांच्या भुमिकेसाठी त्यांनी अलेकची निवड केली.

‘गांधी’ च्या संपुर्ण निर्मिती प्रक्रियेत तो अँटनबरो सोबत होता. गांधींच्या अंत्ययात्रेचं शुटींग करायचं होतं. त्यासाठी दिल्लीतल्या राजपथावर सुमारे पाच लाख लोकांची आवश्यकता होती. 31 जानेवारी 1981 या दिवशी हे शुटींग करण्याचं ठरलं. लोकांनी यात सहभागी व्हावं म्हणून वर्तमानपत्रात जाहिरात द्यायची होती.

रिचर्ड अँटनबरो अलेकला म्हणाले.. “ तू जाहिरात क्षेत्रातला आहेस.. लोकांनी शूटींगसाठी यावं यासाठी तू एक जाहिरात बनवशील? “…. आणि मग 30 जानेवारीच्या हिंदुस्थान टाईम्समध्ये अलेक पदमसीने बनवलेली एक ओळीची जाहिरात प्रसिद्ध झाली…. ३१ जानेवारीला इतिहासाची पुनर्निर्मिती होणार आहे. त्यावेळी तुम्ही तिथे असाल ?

… आणि खरंच त्या जाहिरातीला मिळालेला प्रतिसाद अपूर्व होता. अँटनबरोंच्या मनातील कल्पना ते जशीच्या तशी साकारु शकले ते केवळ आलेकमुळे.

अलेक पद्मसीच्या आत्मकथेचं नाव आहे.. “ अ डबल लाईफ. ”

खरंच तो दुहेरी आयुष्य जगला. चित्रपट.. दूरदर्शन.. वर्तमानपत्र.. यासाठी त्याने शेकडो जाहिराती बनवल्या.. पण तो एक उत्तम अभिनेता होता, दिग्दर्शक होता आणि एक रत्नपारखी सुध्दा.

अलेकनं अनेक जणांना घडवलं. त्यात श्याम बेनेगल होते.. कबीर बेदी होता.. डान्स डायरेक्टर शामक दावर.. अलीशा चिनॉय होती.. पॉपसिंगर शेरॉन प्रभाकर तर त्याची बायकोच. तिच्यामधले गुण हेरुन …. त्याच्याच मार्गदर्शनाने ती पॉप म्युझिकमध्ये टॉपला पोहोचली.

भारतीय समाजमन अचूक जाणणारा.. आपल्या जाहिरातींमधून त्यांच्या भावनेला हात घालणारा इंग्रजी रंगभूमीवर पन्नास नाटकांची निर्मिती आणि दिग्दर्शन करणारा अलेक पद्मसी…. उच्च कोटीची प्रतिभा. कलात्मकता.. सर्जनशीलता.. आणि अपूर्व संघटन कौशल्य.. नाटकातून पैसा कमावणं हे त्याचं उद्दिष्ट कधीच नव्हतं. म्हणूनच तो म्हणतो ….

“रंगभूमी रोजीरोटी मिळवून देऊ शकत नाही, हे खरं आहे…. पण तो माझा श्वास आहे. जाहिरात क्षेत्रात मात्र असं नाही. कॉपी लिहा…. शब्दांशी खेळ करा.. चित्रिकरण करा.. सुंदर कल्पना प्रत्यक्षात आणा.. आणि भरपूर पैसे खिशात टाका. “

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “जठराग्नीत उजळलेलं सोनं !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

“जठराग्नीत उजळलेलं सोनं ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

… अर्थात भुकेलाही खाऊन उरलेली माणसं !

क्षुधा हा संस्कृत शब्द..आणि भूख बहुदा जर्मन भाषेतून जगभर पसरलेला शब्द…आपल्याकडे भूक  अर्थात या शब्दाच्या आधीपासूनच जगात भूक आहेच..सर्वव्यापी! भुकेचा आणि पोटाचा संबंध असणं स्वाभाविक आणि त्यामुळे भुकेल्या पोटी,अर्धपोटी राहिलेल्या लोकांचाही इतिहास असणं स्वाभाविक. 

भुकेपोटी भीकेला लागलेली माणसं,जठराग्नी शांत करण्यासाठी कोणत्याही थराला जाणारी  जगाने पाहिलीत तशी भुकेला खाऊन राहिलेली माणसंही पाहिलीत…ती संख्येने अगदी थोडी असली तरी! 

खरं तर जगात अन्नाची कमतरता कधीच नव्हती. कमतरता होती आणि आहे ती अन्नाच्या समान वितरणाची. कुणाचं ताट शिगोशीग भरलेलं तर कुणाचं ताट निरभ्र आकाशासारखं…रितं! माणसं दैव नावाच्या कुंभाराने घडवलेलेल्या मडक्यांसारखी.. कुणाच्या मुखी लोणी तर कुणा मुखी अंगार पडतो. 

देवाला जगात यापुढे अवतार घ्यावा लागला तर तो भाकरीच्या रुपात घ्यावा लागेल,असं म्हणतात. ज्यांची पोटं भरलेली आहेत आणि ज्यांची रिकामी आहेत…हे दोन्ही गट देवाने अवतार घेण्याची वाट पाहताना दिसतात! 

गानकलेच्या क्षेत्रात अत्युच्च शिखरावर चिरंजीव विराजमान झालेली स्वरांची अपत्ये म्हणजे दीनानाथ आणि माई मंगेशकर यांची पंचरत्ने. त्यांनी, विशेषत: लतादीदी आणि आशाताई या दोघींनी मिळून तर दोन्ही ध्रुव आपल्या आवाजाच्या कवेत घेतले. हृदयनाथ,लता,आशा,उषा आणि मीना यांचे यश देदीप्यमान आहेच. पण त्यापेक्षाही त्यांनी भुकेशी दिलेला लढा असामान्य असाच म्हणावा लागेल. या संघर्षातून त्यांची व्यक्तिमत्वे घडली….अनेक कंगोरे असलेली. ज्याने भूक अनुभवली त्याच्या जीवनात तो अनुभव कदापि विसरता न येणारा असतो. किंबहुना पानात पंचपक्वान्ने वाढलेली असताना, त्यांच्या जिव्हाग्री त्यांनी उपवासनंतर चाखलेला पहिला घास नांदत असतो….आणि तो भरवणारा हातही! 

दैनिक सकाळ सप्तरंग पुरवणीत गेले काही महिने रविवारी पंडित हृदयनाथ मंगेशकर एक महान इतिहास शब्दबद्ध करून ठेवत आहेत….त्यांचे हे कार्य सिद्धीस जावो,ही माता सरस्वतीचरणी प्रार्थना. आजच्या लेखनात माई,आशा,उषा आणि हृदयनाथ यांनी त्यांच्या खानदेशातील गावातून मुंबईपर्यंत केलेल्या रेल्वे प्रवासाची आठवण लिहिली गेली आहे. 

संपूर्ण प्रवासभर सहप्रवासी विविध पदार्थ सेवन करीत असताना प्रचंड भुकेजलेली ही मुलं कुणाकडे हात पसरत नाहीत. पाणी पिऊन भुकेची समजूत काढत काढत उघड्यावर निजतात. किती तरी तासांनी पुढ्यात आलेल्या बिस्किटास आईच्या संमतीशिवाय हात लावत नाहीत. त्यांच्या समोर इतर माणसं जेवून उठत असताना यांच्या चेह-यावर बुभुक्षितपणाची रेषाही उमटत नाही. पहिल्या पंगतीतून काही कारणाने उठावे लागते आणि दुस-या पंगतीत त्यांच्या आईने, माईने दाखवलेला बाणेदारपणा भुकेवर मात करून पंगत सोडून उठतो…आणि ताठ मानेने पुढच्या प्रवासात निघतो! 

तिस-या दिवशी हाता तोंडाची गाठ पडायची होती….पण इथे तो हात दैवी होता आणि तोंड बाळाचे होते. माई,आशा,उषा इत्यादी समोर असताना त्यांच्याशी न बोलता दीदी थेट हृदयनाथ यांच्याकडे आल्या आणि त्यांना अन्नाचा घास भरवला….हा पहिला घास अमृताचा न ठरता तरच नवल! जठरात पेटलेल्या अग्नीत हे स्वर-सुवर्णालंकार काळाने घातले ते जाळाव्यास नव्हेत तर उजळावायास…आणि त्यांचा प्रकाश सा-या जगाने अनुभवला आहे! 

प्रत्यक्ष हा लेख वाचताना प्रत्येक सहृदय माणसाच्या पोटात कालवाकालव झाल्याशिवाय राहणार नाही..असाच हृदयनाथांनी लिहिलेला अनुभव आहे. 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १७ — श्रद्धात्रयविभागयोगः — (श्लोक २१ – २८) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १७ — श्रद्धात्रयविभागयोगः — (श्लोक २१ – २८ ) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः । 

दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतम्‌ ॥ २१ ॥

*

प्रत्युपकार मनी हेतू उद्दिष्ट ठेवुनी फलाचे

क्लेशपूर्वक केले त्या दान जाणी राजसाचे ॥२१॥

*

अदेशकाले यद्दानमपात्रेभ्यश्च दीयते । 

असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाहृतम्‌ ॥ २२ ॥

*

अयोग्य स्थळी, कुकाळी अथवा कुपात्रास दान

ना सत्कार घृणेने करती त्यास जाण तामस दान ॥२२॥

*

ॐ तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः । 

ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा ॥ २३ ॥

*

ॐ तत् सत् त्रिविध नामे असती ब्रह्माला

विप्र वेद यज्ञ रचिले त्यांनी सृष्टी प्रारंभाला ॥२३॥ 

*

तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदानतपःक्रियाः । 

प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिनाम्‌ ॥ २४ ॥

*

याचिकारणे वेद दान तपादि मंत्रोच्चारण 

आरंभ करिती श्रेष्ठ करुनी प्रणवाचे उच्चारण ॥२४॥

*

तदित्यनभिसन्धाय फलं यज्ञतपःक्रियाः । 

दानक्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकाङ्क्षिभिः ॥ २५ ॥

*

तत् जयाचे आहे नाम त्या परमात्म्याचे सकल

यज्ञ तप दान नाही फलाशा मोक्षाकांक्षा केवल ॥२५॥

*

सद्भावे साधुभावे च सदित्येतत्प्रयुज्यते । 

प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्दः पार्थ युज्यते ॥ २६ ॥

*

सत्यत्व श्रेष्ठत्व वर्णिते सत् नाम परमेशाचे

सत् योजिती वर्णन करण्या पार्था उत्तम कर्माचे ॥२६॥ 

*

यज्ञे तपसि दाने च स्थितिः सदिति चोच्यते । 

कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते ॥ २७ ॥

*

यज्ञात तपात दानात असते स्थिती तीही सत्

परमात्म्यास्तव आचरले ते समग्र कर्म सदैव सत् ॥२७॥

*

अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत्‌ । 

असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह ॥ २८ ॥

*

हवन दान तप सत्कार्य आचरले श्रद्धेच्या विना

असत् कर्म भूलोकी वा परलोकी फलदायी ना ॥२८॥

 

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे श्रद्धात्रयविभागयोगो नाम सप्तदशोऽध्यायः ॥१७॥

ॐ श्रीमद्भगवद्गीता उपनिषद तथा ब्रह्मविद्या योगशास्त्र विषयक श्रीकृष्णार्जुन संवादरूपी श्रद्धात्रयविभागयोग नामे निशिकान्त भावानुवादित सप्तदशोऽध्याय संपूर्ण ॥१७॥

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्टान्जीन पद्मा: आपल्या सेनेचा ‘स’पोर्टर! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

स्टान्जीन पद्मा: आपल्या सेनेचा ‘स’पोर्टर! ☆ श्री संभाजी बबन गायके 

स्टान्जीन पद्मा: आपल्या सेनेचा ‘स’पोर्टर!

The (sup)porters of the Indian Army !  

स्टान्जीन पद्मा सियाचीन ग्लेशियर परिसरातील नुब्रा खोऱ्यातील एका दुर्गम गावात राहतो. या भागातील जीवन अतिशय कष्टाचे आणि जिकीरीचे. तापमान कायमच जवळजवळ शून्याच्या खाली. उदरनिर्वाह करणे खूपच कठीण. पण येथील मूळच्या लोकांना या हवामानाची सवय झालेली असते. यांपैकीच एक तरुण, स्टान्जीन पद्मा. याने सुमारे बारा वर्षे भारतीय सैन्यासाठी भारवाहक म्हणून सेवा बजावताना संकटात सापडलेल्या जवानांचे प्राण वाचवलेले आहेत. शिवाय गिर्यारोहक, सैनिक यांचे मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला अनमोल सहाय्य केले आहे.

१९८४ मध्ये भारतीय सेनेने ‘ऑपरेशन मेघदूत’ हाती घेतले आणि सियाचीन ग्लेशिअर वर वर्चस्व प्रस्थापित केले. या अतिशय धाडसी, रोमांचक आणि शौर्यपूर्ण कामगिरीस या वर्षी एप्रिल मध्ये चाळीस वर्षे पूर्ण झाली. पाकिस्तानी सैन्याने याच ठिकाणी आपल्या आधी पोहोचून त्यांच्या सैन्य चौक्या प्रस्थापित करण्याची गुप्त योजना आखली होती…. पण भारतीय सैन्य त्यांच्या आधी तेथे पोहोचले! तिथे टिकून राहण्यासाठी अत्यावश्यक रसद हवाई मार्गाने पोहोचवली गेली. आणि हजारो सैनिक बर्फातून तीन दिवस-रात्र चालत इच्छित स्थळी पोहोचले. आणि म्हणूनच आज ती सीमा भारतासाठी सुरक्षित करण्यात भारतीय सैन्याला यश आले आहे… आणि पाकिस्तान आपल्याकडे पहात थयथयाट करीत बसला आहे… अन्यथा आज चित्र काहीसे वेगळे असले असते. असो.

सियाचीन ग्लेशिअरवर तापमान उणे चाळीस आणि आणखीही खाली जात असते. अशा भयावह, जीवघेण्या हवामानात निव्वळ श्वास घेणे हेच मोठे आव्हान ठरते. तेथील हवामानात हेलीकॉप्टर उडवणे हे अत्यंत धोक्याचे ठरते. पण बरेचदा यातूनच रसद खाली टाकावी लागते, आणि मग ही रसद पाठीवर लादून घेऊन वरपर्यंत पोहोचवावी लागते. काहीवेळा या कामासाठी याक सारख्या प्राण्यांचा वापर केला जातो, पण हे प्राणीसुद्धा या हवामानात फार काळ तग धरू शकत नाहीत, किंवा त्या उंचीवर पोहोचू शकत नाहीत. मग हे वाहतुकीचे काम कोण करणार? जिथे मोकळ्या माणसाला बर्फात एक-एक पाऊल टाकीत पुढे जायला कित्येक तास लागतात, पायांखाली शेकडो फूट बर्फाची दरी असू शकते, शरीराचा कोणताही भाग काही वेळासाठी उघडा राहिला तर हिमदंश होतो, साधा श्वास घ्यायला त्रास होतो तिथे हे काम कोण उत्तम करू शकेल?

सियाचीन परिसरातील निसर्गसुंदर नुब्रा खोऱ्यातील रहिवासी उदरनिर्वाहाचे साधन म्हणून हे काम अक्षरश: अंगावर घेतात. पाठीवर सुमारे वीस किलो वजनाचे सामान घेऊन उंच पर्वत चढतात…. सियाचीन येथे बर्फातील चौक्यांवर तैनात असलेल्या सैनिकांसाठी खाद्यपदार्थ, इंधन पोहोचवतात…. पिण्यायोग्य पाणी बनविण्यासाठी बर्फ खोदून देतात, डोंगर कड्यांवर पोहोचण्यासाठी शिड्या, दोर लावून देतात. सुमारे बावीस हजार फूट उंचीवर तैनात असलेल्या आपल्या सैनिकांसाठी हे पोर्टर-तरुण खूप महत्वाची भूमिका बजावतात.

बर्फाळ भागात आयुष्य गेल्यामुळे ह्या लोकांना त्या परिसराची, हवामानाच्या लहरीपणाची खूप जवळून ओळख असते. या ठिकाणी वारंवार घडणाऱ्या हिमस्खलनाच्या घटनांत या पोर्टर्सची खूप मोठी मदत होते. काही ठिकाणी तर केवळ दोरीच्याच साहाय्याने पोहोचता येते. आणि यात या लोकांचा हातखंडा आहे.

वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी तर सैनिकाना त्वरीत हलवावे लागते… अशा वेळी हेच पोर्टर्स मदतीला धावून येतात. भारतीय लष्कर या लोकांना सलग नव्वद दिवसच काम देऊ शकते. एरव्ही हे तरुण तेथे येणाऱ्या गिर्यारोहकांचे वाटाडे म्हणून काम करतात.

जेंव्हा पोर्टरचे काम उपलब्ध नसते तेंव्हा जवळच्या शहरात जाऊन हे लोक मिळेल ते काम करतात. आणि पोर्टर म्हणून भरती होण्यासाठी अक्षरश: दोन अडीचशे किलोमीटर्सचे अंतर बर्फातून चालत पार करतात. भरती करून घेताना या लोकांची रीतसर शारीरिक चाचणी, निवड स्पर्धा घेतली जाते. सियाचीन मध्ये सुमारे शंभर लोकांची या कामासाठी निवड केली जाते.

अतिधोकादायक ठिकाणी भारवाहकाचे काम करणाऱ्यास एका दिवसासाठी रुपये ८५७ आणि तळावर काम करण्यासाठी रुपये ६९४ इतका मोबदला दिला जातो. आता या दरांमध्ये बदल झाला असेल. कामाच्या ठिकाणी असलेली हवामानाची आव्हाने, शत्रूपासून असलेला धोका यांमुळे काही भारवाहकांना आपला जीवही गमवावा लागला आहे.

एकदा पदमाला आपल्या सेनेच्या अतिउंचीवरील चौकीवर तातडीने अन्नपदार्थ पोहोचवण्याचे आदेश मिळाले. अत्यंत प्रतिकूल हवामानाची पर्वा न करता हा गडी स्नो स्कूटर घेऊन निघाला आणि चौकीवर अन्न पोहोचवले. मात्र माघारी येत असताना त्याची स्कूटर नादुरुस्त झाली ती तशीच ठेवून तो पायी खाली निघाला. मात्र धुक्यामुळे पुढचे काही दिसू न शकल्याने एका अत्यंत खोल दरीत कोसळला आणि बेशुद्ध पडला. त्याच्या सुदैवाने सकाळी एक गस्ती पथक त्याला शोधायला येऊ शकले. आणि मोठ्या परीश्रमाने त्याला तिथून बाहेर काढले गेले.

 त्याचा एक सहकारी निमा नोर्बु असाच एका दरीत कोसळला होता. त्याच्या सुटकेचे सर्व प्रयत्न विफल झाले होते. पण पदमाने अगदी हट्टाला पेटून वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून हेलीकॉप्टरची व्यवस्था करवून घेतली आणि निमाचा ठावठिकाणा शोधून काढला. स्वत: बर्फाच्या खोल दरीत उतरून काही तासांच्या अथक परिश्रमाने निमाला मृत्यूच्या खाईतून सुरक्षित बाहेर काढले… परंतू बर्फदंशामुळे निमाचा एक हात आणि दोन्ही पाय गुडघ्यापर्यंत कापावे लागले! 

 सियाचीन मध्ये सैनिक जेवढे कष्ट, त्रास भोगतात तेवढेच हे आपले स’पोर्टर्स’ ही कष्ट करतात… पण त्यांचे देशप्रेम अतूट आहे.

तांत्रिक कारणामुळे एका भारवाहकास सलग नव्वद दिवसांपेक्षा जास्त दिवस कामावर ठेवता येत नाही. ८९ दिवस भरल्यावर हे तरुण पुन्हा आपल्या गावी परततात, वैद्यकीय तपासणी करून घेतात आणि काही दिवसांनी पुन्हा कामावर येऊ शकतात…

पदमा वर्षातून किमान तीन वेळातरी सियाचीन वर जायचा.. ! लेह मधील जवाहर नवोदय विद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेल्या पदमाने आपल्या सहकारी भारवाहकांचा हिशेब ठेवण्याची, त्यांच्या कामाचे नियोजन, पर्यवेक्षण करण्याचीही जबाबदारीही उत्तमरीत्या पार पाडली आहे.

२०१३ मध्ये पाच सैनिक बर्फाखाली गाडले गेले होते. त्यांना वाचवण्यासाठी पाच जणांचे पथक धाडले गेले, त्यात पदमाही होता. पण या बचाव पथकावर एक बर्फाचा कडा कोसळला. या पाचपैकी एक जण केवळ कमरेइतकाच गाडला गेल्याने तो बाहेर पडला आणि त्याने इतरांना बाहेर काढले. आपल्या जीवाची पर्वा न करता हे पाचही जण दुसऱ्या दिवशी पुन्हा बचाव मोहिमेवर गेले आणि त्यांनी दोन सैनिकांचा जीव वाचवण्यात यश मिळवले! 

स्टान्जीन पद्मा याला भारताच्या राष्ट्रपती महोदयांनी ‘जीवन रक्षा पुरस्कार’ देऊन सन्मानित केले आहे. भारतीय सैनिकांच्या पाठीशी आणि मागे पुढे उभ्या असणाऱ्या या भारवाहकांचे आभार! 

शत्रू या भारवाहकांवर गोळीबार करायला कमी करत नाही. काल परवाच कश्मीरमध्ये दोन पोर्टर्स अतिरेक्यांच्या गोळीबारात मरण पावले. आपल्या देशाच्या सीमा राखायला असे अनेक तरुण कामी येतात…. त्यांच्या प्रती आपण आभारी असायला पाहिजे!

कृपया या शूर, हिम्मतवान, साहसी देशभक्तांविषयीची ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवावी. मी ही माहिती आंतरजालावरून इंग्रजी भाषेतील ‘दी बेटर इंडिया’, ‘द कॅरावान’ अशा स्रोतामधून मिळवली असून भाषांतरित केली आहे..

जय हिंद ! 

© श्री संभाजी बबन गायके

 ९८८१२९८२६०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “’तो’ का ‘ती’?” मूळ लेखक : डॉ. ना. सोमेश्वर अनुवाद : श्री मंगल पटवर्धन ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलु साबणेजोशी 

?इंद्रधनुष्य? 

☆ “’तो’ का ‘ती’?” मूळ लेखक : डॉ. ना. सोमेश्वर अनुवाद : श्री मंगल पटवर्धन ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी

१८६५ मध्ये एक ब्रिटिश सैन्यातील डॉक्टर मरण पावला. तसं पाहिलं तर त्याच्या मृत्यूबद्दल सांगण्यासारखं काही विशेष नव्हतं. त्याला खूप जुलाब झाले होते. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी सगळे प्रयत्न केले. तरी देखील तो वाचू शकला नाही. अजूनही ओ. आर. एस. किंवा अँटीबायोटिक्सचा शोध लागला नव्हता. जुलाब झाल्यामुळे मृत्यू येणे, हे सर्वसामान्य होतं. या डॉक्टरच्या मरण्याचं कुणाला काही फारसं वाटलंही नाही. पण… पण… पण काय? 

जेम्स मिरांडा बॅरी (१७८९-१८६५) सैन्यातील एक उच्च पदावर असणारा तो डॉक्टर ब्रिगेडियरच्या हुद्द्यापर्यंत पोहोचला. जेम्सचे वडील जेरेमिया व आई मेरी ॲन बर्कली (barkali).. यांचं ‘जेम्स’ हे दुसरं अपत्य. १७८९ मध्ये ते आयर्लंडमध्ये राहत होते. वडिलांचं किराणाचं दुकान होतं. तेच त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन. वडील जेरेमिया खूप खर्चिक स्वभावाचे ! “बचत” या शब्दाशी त्यांचं काही नातं नव्हतं. त्यामुळे ते लवकरच कर्जबाजारी झाले. उधारी देणे अशक्य होऊन बसल्याने कुटुंबासमवेत डब्लिन येथील मार्शल सिया इथे स्थायिक झाले. इथेही त्यांची सुटका झाली नाही. फसवणुकीच्या गुन्ह्यादाखल त्यांना जेलची हवा खावी लागली. त्यामुळे आई व मुलं लंडनला आली. जेम्स बॅरी चांगला कलाकार होता. हे छोटं मूल आपल्या मामाच्या सहवासात इतकं रमलं की, त्याच्या मित्रांनाही त्यांनी आपलंसं केलं. त्यापैकी फ्रान्सिस्को द मिरांडा व डॉक्टर एडवर्ड फ्रेयर हे खूप जवळचे झाले. एडवर्ड फ्रेयर यांनी जेम्सच्या शेवटच्या दिवसात खूप सेवा केली व त्याच्यावर एक पुस्तकही प्रकाशित केलं. मिरांडा व फ्रेयर इतके जवळचे झाले की या दोघांनी मिळून जेम्सच्या शिक्षणाचा खर्च केला. मामाच्या मृत्यूनंतर त्याची सगळी प्रॉपर्टी या मुलाच्या नावाने झाली. त्यामुळे त्याला वैद्यकीय शिक्षण घेणे सहज शक्य झाले.

३० नोव्हेंबर १८०९ मध्ये ‘लॅडीस स्माक’ जहाजामधून लंडनहून ”विश्वविद्यालया”मध्ये प्रवेश घेण्यासाठी निघाला जेम्स मिरांडा बॅरी.

वैद्यकीय कॉलेजमध्ये एक हुशार विद्यार्थी म्हणून जेम्स बॅरी ओळखला जाऊ लागला. नापास हे लेबल कुठेही न लागता वैद्यकीयच्या शेवटच्या वर्षापर्यंत आला. त्याने शेवटच्या वर्षाची परीक्षा देऊ नये, वयाने लहानसर दिसतो या कारणाने त्याच्यावर बंदी घालण्यात आली. ‘थोडा मोठा होऊ दे, थोडी वर्षे जाऊ दे’, असा निर्णायक मंडळांनी आदेश दिला. तरी जेम्स बॅरीने हार मानली नाही. त्याची इच्छाशक्ती, महत्त्वाकांक्षा त्याला स्वस्थ बसू देईना.

डेव्हिड स्टुअर्ट एस्क्रिन जो श्रीमंत, नावाजलेली व्यक्ती म्हणून ओळखला जायचा, त्याची जेम्सने भेट घेतली. मंत्रिमंडळाशी बोलणी करून त्यांना जेम्सचं म्हणणं पटवून दिल्याने जेम्सला शेवटच्या वर्षाला बसण्याची परवानगी मिळाली.

अशा तऱ्हेने १८१२ मध्ये चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊन जेम्स बॅरीला डॉक्टरची पदवी मिळाली. लगेचच म्हणजे १८१३ मध्ये आर्मी हॉस्पिटलमध्ये ‘हॉस्पिटल असिस्टंट’ म्हणून रुजू झाला. अवघ्या दोनच वर्षांत म्हणजे १८१५ मध्ये जेम्स ‘असिस्टंट स्टाफ सर्जन’ म्हणून रुजू झाला. त्याची कुशाग्र बुद्धी, कामातील तत्परता व डॉक्टरी पेशातील ज्ञान त्याला इथवर आणू शकलं. मिलिटरी भाषेत हे ‘लेफ्टनंट’च्या हुद्द्यावर असल्याप्रमाणे होतं.

डेव्हिड स्टुअर्ट एस्क्रिनकडून एक पत्र घेऊन केप टाऊनला १८१६ मध्ये आला. केप टाऊनचे तेव्हाचे गव्हर्नर लॉर्ड चार्ल्स हेन्री सॉमरसेट यांची त्याने भेट घेतली. योगायोगाने त्याच वेळी गव्हर्नरच्या मुलीची तब्येत बिघडली होती. जेम्सने इलाज करून तिला अगदी ठणठणीत बरी केली. त्यामुळे जेम्स गव्हर्नरच्या मर्जीतला बनला आणि त्यांच्या घरातील एका सदस्यासारखा तिथेच राहू लागला. गव्हर्नर व जेम्सच्या नात्यासंबंधी काहीबाही बोललं जाऊ लागलं. ‘होमोसेक्शुअल संबंध असावेत’, अशीही कुजबूज सुरू झाली. १८२२ मध्ये गव्हर्नरने ‘कलोनियल मेडिकल इन्स्पेक्टर’च्या पदावर नियुक्ती केली. त्याच्याबाबतीत ही खूपच मोठी उडी होती. त्याच्या कामामुळे सर्वत्र जेम्सचा गवगवा होऊ लागला. पैसा व प्रतिष्ठा त्याच्या दाराशी लोळण घेत होते.

१८२६ मध्ये त्याला नावलौकिक मिळण्यासाठी आणखीन एक घटना घडली. एक गरोदर बाई पोट खूप दुखू लागल्याने जेम्सकडे आली. नॉर्मल डिलिव्हरी होण्याची लक्षणे दिसत नव्हती. त्यामुळे जेम्सने सिझेरियन करून बाळाला सुखरूपपणे बाहेर काढलं. आई व बाळ सुखरूप होते. ही दक्षिण आफ्रिकेतील पहिली सिझेरियन शस्त्रक्रिया होती. त्यामुळे बाळाचं नाव “जेम्स बॅरी मुनिक” असं ठेवलं. पुढील काही वर्षांत ‘जेम्स बॅरी मुनिक हेरटजोर्ग’ नावाचा पंतप्रधान झाला. एवढं “जेम्स बॅरी” हे नाव प्रसिद्धीला आलं.

केप टाऊन शहरात जेम्स आपल्या क्रांतिकारी कामामुळेही प्रसिद्ध झाला. मानवी हक्कासाठी लढणे हा त्याचा स्वभाव. आरोग्याविषयी सगळीकडे भाषण देत असे. त्याची अंमलबजावणी होते ना, याकडेही त्याचं लक्ष असे. केप टाऊनमध्ये बनावट डॉक्टर, नकली औषधे पुरवून लोकांना लुबाडत. जेम्स बॅरीने गव्हर्नर लॉर्ड चार्ल्स हेन्री यांना त्याविरुद्ध कारवाई करण्याकरिता विनंती केली. हा अन्याय जेम्सला सहन होत नसे. शहरात स्वच्छता राखण्यासाठी त्याने बरेच उपक्रम हाती घेतले.

त्याकाळी जेलमध्ये कैद्यांच्या बरोबर कुष्ठरोगीही होते. त्यांना स्वतंत्रपणे खोली देण्यात आली. स्वच्छता पाळण्यासाठी नियम घालून दिले. समाजातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ पाणी पिण्यास मिळण्याची व्यवस्था केली.

भांडण, हातापायी, मारामारी करावी लागल्यास कधी माघार घेत नसे. त्याच्या अशा वागण्याने फ्लोरेन्स नाइटिंगेलपासून बऱ्याचजणांना हा “भांडखोर जेम्स” म्हणून आवडत नव्हता.

जेम्स याने जमैका, सेंट हेलीना, वेस्टइंडीज, माल्टा इत्यादी ठिकाणी काम केले. १८५७ मध्ये तो कॅनडाला गेला. तिथे त्याची ‘इन्स्पेक्टर जनरल ऑफ मिल्ट्री हॉस्पिटल’ या हुद्यावर नियुक्ती झाली. १८५९ मध्ये जेम्स बॅरीची प्रकृती खालावली. त्यामुळे त्याला आपल्या मायदेशी लंडनला परतावं लागलं.

१८६५ मध्ये जुलाब खूप झाल्याने तो मरण पावला. त्याने आपल्या मृत्युपत्रात पूर्वीच लिहून ठेवलं होतं – ‘आपण परिधान केलेल्या कपड्यासहितच आपले शवसंस्कार करावेत. ‘ पण मृत्युपत्र वेळेवर न मिळाल्याने त्याला नग्नावस्थेत आंघोळ घालावी लागली. त्यावेळी अशीच प्रथा होती. अंघोळ घालण्याकरिता जेव्हा विवस्त्र करण्यात आलं, तेव्हा कुणाचाही आपल्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. जेम्स बॅरी हा पुरुष नसून “मार्गरेट ॲन बर्कली” ही स्त्री आहे, हे जगजाहीर झालं. नाही तर हे गूढ – गूढच राहिलं असतं व तिच्याबरोबरच दफन केलं गेलं असतं. जेम्स हा पुरुष नसून स्त्रीच आहे, यावर बऱ्याचजणांना आश्चर्य वाटलं. काहींचा विश्वास बसत नव्हता. तर काहीजण ‘आपल्याला तो पुरुष नसावा’, असा संशय येत होता, अशी कुजबूज सुरू झाली.

या घटनेमुळे फक्त डॉक्टरच नव्हे, तर पूर्ण ब्रिटिश साम्राज्यच हादरलं. त्याच्या मृत्यूनंतर ब्रिटनचा प्रसिद्ध कादंबरीकार चार्ल्स डिकन्सने “ए मिस्ट्री स्टील” नावाची कादंबरी लिहिली. बॅरीबद्दल अनेक कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. “द स्ट्रेंज स्टोरी ऑफ जेम्स बॅरी” लेखिका – ‘इझाबेल रे’.

 तसंच एक नाटकही रंगमंचावर आलं. डिकन्सच्या म्हणण्याप्रमाणे जेम्स बॅरीची कथा गूढ व कुतूहलपूर्ण आहे.

मार्गरेट ॲन बर्कली, आता ‘जेम्स बॅरी’ या नावाने ओळखू जाऊ लागला. तिने आपली केशभूषा, वेशभूषा बदलली. स्तन दिसू नयेत म्हणून मफलरने घट्ट बांधून घेतले. खांदे रुंद दिसण्यासाठी त्याला शोभेसा वेष परिधान केला. गळा दिसू नये म्हणून तो झाकण्यासाठी कोट घालू लागली. भाषा राकट व आवाजात जरबीपणा आणला. उंची कमी असल्याने उंच टाचेचे बूट वापरू लागली. एवढं सगळं करूनही दाढी मिशा नसल्याने चेहऱ्यावरचा नाजूकपणा उठून दिसायचा. आपल्या आवाजात जरब, कर्कशपणा व वागण्यात बेफिकीरपणा आणला. हालचाल, चालणं, बोलणं सगळं पुरुषी दिसण्याकडे ती प्रयत्नशील राहिली.

अशा तऱ्हेने मार्गारेटला ‘जेम्स बॅरी’ म्हणून “पुरुष” होण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. कारणही तसंच होतं. त्या काळी स्त्रियांना डॉक्टर होण्यास अनुमती मिळत नव्हती. स्त्रियांना दुसरा दर्जा मिळायचा. स्त्रिया पुरुषांएवढ्या हुशार नसतात. त्यांची कार्यक्षमता पुरुषांएवढी नसते, असा समज होता. स्त्रिया म्हणजे फक्त मुलांना जन्म द्यायचं साधन. त्यांना शिक्षण कशाला हवं? – असाच सर्वत्र समज होता. त्यामुळे स्त्रियांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळत नव्हतं. अशा परिस्थितीत डॉक्टरचे शिक्षण घेणे स्वप्नवतच. ‘डॉक्टर होऊन दाखवेनच’ ही तिची प्रबळ इच्छा तिला स्वस्थ बसू देईना. त्यासाठी तिने पुरुषी वेश, आवाज, चालणं, बोलणं इत्यादीमध्ये बदल करण्याचं ठरवलं व ती सगळीकडे ‘पुरुष’ म्हणूनच वावरू लागली.

अधिकृत दाखल्याप्रमाणे ब्रिटनची पहिली महिला डॉक्टर एलिझाबेथ गॅरेट अँडरसन (१८३६-१९१७) १८६५ मध्ये वैद्यकीय परीक्षा पास झाली. पण हिला पदवी मिळाली त्याच वर्षी जेम्स बॅरीच निधन झालं. यावरून हे सिद्ध होतं की, ‘जेम्स बॅरी उर्फ मार्गारेट’ ही ‘ब्रिटनची पहिली महिला डॉक्टर’ असं म्हणता येईल.

अशी ही ब्रिटनची आगळीवेगळी अचंबित करणारी सत्य घटना तिच्या मरणोत्तर उघडकीस आली. “तो” नव्हे, तर “ती” होती “मार्गरेट ॲन बर्कली”.

मूळ लेखक: डॉक्टर ना. सोमेश्वर 

अनुवाद: मंगल पटवर्धन 

(विश्ववाणी कन्नड पेपर)

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कर्माचा सिद्धांत — लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

कर्माचा सिद्धांत — लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

कोणाचीही हाय लागून घेऊ नये, त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात….. हाच असतो कर्माचा सिद्धांत. 

“जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर॥ 

क्षणिक सुखासाठीच आपुल्या, कुणी होतो नितीभ्रष्ट “……  हेच केलेल्या कर्माचे फळ आहे

काही लोकांना नाही पटणार हा विषय, पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतलाय आणि त्याचे भोग ते भोगत असतात, त्यांना नक्कीच पटेल,…!!! अनेक कारणांनी तळतळाट दिलेला असतो, … जसे की…!!!

1) शारिरीक, आर्थिक, फसवणूक करणे …

2) समाजात, समारंभात अपमानास्पद वागणुक, देणे…

3) कोणाचे जाणीवपूर्वक मन दुखावले असू शकते,…                  

 4) कोणावर जाणीवपूर्वक अन्याय केला गेलेला असतो,…

5) कोणाची काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असते,…

6) मानसिक, सामाजिक, राजकीय छळ केलेला असेल,…..

7) कोणाची हक्काची फसवूनक करून खोट्या कागद पत्रा मार्फत व पुरावे देऊन, दबावतंत्राचा वापर करून प्रॉपर्टी हडपली असेल…

8) कोणाला अनिती करायला बळ दिल असेल…

9) राजकीय, सामाजिक, शारीरिक दुखापत केलेली असेल, …

10)  विश्वासघात करून गद्दारी करून गैरफायदा घेतला गेलेला असेल…              

11) ज्याने आपल्यावर अनेक उपकार केले असतील आणि त्याच्याच पाठीत स्वतःच्या स्वार्थासाठी खोटे आरोप करून खंजीर खुपसुन गद्दारी केली असेल…

12) कोणाचे आपल्यावर उपकार असतील त्याचा त्याला जाणीवपूर्वक विसर पडणे किंवा त्याने आपल्यासाठी केलेला आकास्मित खर्चाचे पैसे बुडवणे, किंवा त्यांच्या उपकाराची जाणीव न ठेवणे, भ्रष्ट बुद्दीने वागणे.आणि बदला घेणे…

अश्या प्रकारच्या त्रासाचे कुठलेही कारण असो… वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास झालेला असतो व होत असतो, तो खुप दुःखी  होतो, त्याचे मनोबल कमकुवत होत मनस्ताप होत असतो, पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकते, आणि त्या जाणुन-बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे जाणीवपूर्वक समजत नसेल. 

पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो, त्या व्यक्तीकडुन चमत्कार होत नाही, किंवा  देवदेखील शाप देत नाही किंवा काठीने मारत नाही, अशी माणसे निर्दयी, निष्ठुर, व हरामखोर असतात.

….. पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडुन अतिशय तेजस्वी नकारात्मक ऊर्जाशक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते,  मग त्या समोरच्या व्यक्तीला हाय हाय लागते, त्यालाच जनता ‘ तळतळाट ‘ 

असे म्हटले जाते.

मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो, त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही, किंबहुना झाले तरी फार काळ टिकत नाही,  सतत अपयश येणे,  घरात आजारपण येणे, अश्या अनेक प्रकारची काहीही घटना घडू शकतात,…

आपण किती खरे आहोत व किती खोटारडे आहोत हे फक्त त्या महाखोटारड्या व्यक्तीस व आपल्याला व आपल्या अंतर्मनालाच सर्व माहीत असते.

समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजेच पाप लागणे. त्याची परतफेड शक्यतो त्यास याच जन्मात त्याला कुठल्यातरी मार्गाने करावीच लागते, तो जरी कितीही जोरात बोलत असेल अथवा हसून बोलत असेल परंतु ते सर्व लोकांना दाखवण्यासाठी असते.  मात्र तो अंतर्मनातून बेचैन व अस्वस्थ असतो. त्याला सहज शांत झोप व स्वास्थ मिळत नाही. अनेक आजारांनी त्रस्त असतो…

तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक, चांगल्या-वाईट गोष्टींचा हिशोब सव्याज परत करावाच लागतो.  मी एका पुस्तकात वाचले होते, राजा धृतराष्ट्राचे शंभरच्या -शंभर पुत्र युध्दात मारले गेले, तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की “ असे का व्हावे ? माझ्या संबंध जीवनात मी असे कोणतेही महान पातक केलेलं नाही, की ज्याच्या परिणामस्वरूप सर्वच्या-सर्वच पुत्रांचा मृत्यु आपल्या डोळ्यांसमोर पाहून त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबी यावे?“  

तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपले पूर्व-जन्म पहाण्याची दिव्य-दृष्टि दिली.

धृतराष्ट्र राजाने दिव्य-दृष्टीद्वारा पाहिले की साधारण पन्नास जन्मापुर्वी तो एक पारधी होता, आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती. आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले. मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक पक्षी आंधळे झाले तर पक्षांची शंभरएक लहान पिल्ले उडू न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडली.            

….. धृतराष्ट्र राजाची त्यावेळची ती क्रिया होती, त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राजाचे शंभर पुत्र युध्दात मारले गेले तेव्हाच ते पुर्ण झाले. कर्म हे त्याचे फळ देऊनच शांत होते.

प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टींचा हिशोब हा होतोच, हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांतच आहे.  चांगले कर्म, चांगले फळ देऊनच शांत होते. वाईट कर्म, वाईट फळ देऊनच शांत होते. फक्त वेळ आणि काळ  मागे-पुढे होऊ शकतो. हाच कर्माचा सिद्धांत आहे.आता आपणच ठरवायचे आहे, आपले कर्म कसे हवे.

….. ” जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर॥ 

क्षणीक सुखासाठीच आपुल्या, कुणी होतो नितीभ्रष्ट “….  हेच केलेल्या कर्माचे फळ आहे म्हणून ….. 

🌺 सर्वप्रथम आपण व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सूचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा. पण लोकशाही  व संविधान जिवंत ठेऊन वाचवा…!!!

🌺 एकमेकांना अडचणीत आणू  नका, त्यापेक्षा मदत करा, जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा, नको त्या उठाठेवी करू नका, वाद  वाढवू नका, दुसऱ्याच्या वहीवाट संपत्तीवर आपली समजून वागू नका, ते पाप आहे …!!!

🌺 समाजातील खोट्या, राजकारणी व स्वार्थी, मतलबी आणि विश्वास घातकी लोकांपासून नेहमीच दूर रहा, खोट्या अफवांवर विश्वास ठेवण्याआधी प्रत्यक्ष खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा…!!!

🌺 “प्रत्येकाचे जीवन, आयुष्य फार सुंदर आहे.  ते आनंदात जगा व दुसऱ्यांनाही आनंदी जगू द्या. स्वार्थ व अहंकार कधीही मनात ठेऊन वागू नका, वाईट व कठीण प्रसंगाची वेळ कधी, केव्हा आणि कुठे कुणावर येईल हे कुणीही सांगूच  शकत नाही हे लक्षात ठेवा”…!!! 🙏

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एक “महावेडा” तलाठी… लेखक : श्री संपत गायकवाड ☆ श्री सुनीत मुळे ☆

श्री गजानन जाधव

? इंद्रधनुष्य ?

☆ एक “महावेडा” तलाठी… लेखक : श्री संपत गायकवाड ☆ श्री सुनीत मुळे ☆

२०१६ मध्ये तलाठी म्हणून नोकरी लागल्यावर मिळणार्‍या पगारातील ५०% रक्कम गरीब मुलांच्या शिक्षणावर व अभ्यासिकेवर खर्च करणारा “महावेडा” तलाठी गजानन जाधव.

वास्तविक गजानन जाधव हे प्रोफेसर, प्राचार्य वा विद्यापीठात कुलगुरु व्हायला पाहिजे होते. त्यांनी अचंबित करणारे कार्य केले असते.

स्वतःचे लग्न कमी खर्चात करुन दहा गावात पुस्तकं देत दहा गावात अभ्यासिका सुरु केली. बहिणीच्या लग्नात एक लाख रुपयांची पुस्तकं भेट दिली. विचारवंतांचे शेकडो विचार व डझनभर लिहिलेल्या पुस्तकांपेक्षा गजानन जाधव या वेड्या तलाठ्याची एक कृती श्रेष्ठ वाटते. लाखात लाच घेणारा क्लास वन अधिकारी श्रीमंत की ५०% पगारातून खर्च समाजासाठी देणारा क्लास थ्री तलाठी श्रीमंत… ??? शासकीय विभागात भ्रष्टाचारी असतात तसे देवदूत व मसीहाही असतातच.

२८-०२-२०२१ रोजी कोलारा येथे लग्न साधेपणाने करून चिखली तालुक्यातील दहा गावात स्वखर्चातून ग्रंथ देऊन, अभ्यासिका उभारुन समाजऋण फेडण्याचा निश्चिय करणारा महावेडा तलाठी- गजानन जाधव. २०१८ साली बहिणीच्या लग्नात एक लाख रुपयांची पुस्तके गोद्री व कोलारा गावातील अभ्यसिकेला देणारा शिक्षणप्रेमी तलाठी.

वडील मृत्यू पावल्यानंतर आईने शेती व मजुरी करुन ३ मुली व गजाननला शिक्षण देऊन वाढविले. इलेक्ट्रॉनिक दुकानात नोकरी करत डी एड व बी एड केले. २०१६ ला तलाठी म्हणून नोकरीवर रुजू. पगारातील ५०% रक्कम गरीब मुलांच्या शिक्षणासाठी व अभ्यासिकेसाठी खर्च करतात. बुलढाण्याचे रहिवासी असणारे गजानन जाधव हे औरंगाबाद येथील वैजापूर येथे तलाठी म्हणून कार्यरत आहेत. २८ फेब्रुवारी २०२१ रोजी स्वतःच्या लग्नात दहा गावात स्वखर्चाने ग्रंथासह अभ्यासिका उभारण्याचा संकल्प करुन पूर्ण केला आहे.

२०२१ नंतर आजअखेर दिवठाणा, बोरगाव वसू, सवना, सोनेवाडी आणि शेलुद या ठिकाणी पुस्तके दान करुन अभ्यासिका सुरू केल्या आहेत. शिक्षणामुळे आयुष्य बदलते पण आर्थिक अडचणींमुळे मुलांना शिक्षण घेता नाही. मुलांना आर्थिक कारणांमुळे शिक्षण घेण्यात अडचणी येऊ नयेत म्हणून पगारातून मदत करतात. गरीबीतून आल्यामुळे गरजा कमी आहेत. त्यामूळे ५०% पगारातील रक्कम खर्च करण्यात कोणतीही अडचण नसल्याचे गजानन सांगतात.

मुळात डी एड व बी एड झाल्यामुळे शिक्षणाबद्दल प्रचंड आस्था आहे. अभ्यासिका व पुस्तके यामुळे मुलांचे आयुष्य बदलते याची जाणीव डी एड व बी एड करताना झाल्यामुळे गजानन यांनी आईशी बोलून समाजासाठी मदत करायला सुरुवात केली.

महसूल विभागातील तलाठी हे ग्रासरुट लेवलवरचे महत्त्वाचे पद आहे. महसूल विभागातील लोकांच्या अनेक कथा आपण ऐकतो. लाच घेताना वरिष्ठ अधिकारी पकडले जात असताना तृतीय श्रेणीतील एक तलाठी कर्मचारी मात्र पगारातील ५०% रक्कम समाजासाठी खर्च करतात, ही गोष्ट गजानन यांच्या मनाची श्रीमंती दर्शविते, दानत दाखवून देते.

वडील अकाली मृत्यू तीन बहिणींचे शिक्षण व लग्ने, पार्ट-टाइम नोकरी करत करत शिक्षण व स्पर्धा परीक्षेतून तलाठी. हे सर्व करत असताना आईचे कष्टकरी जीवन. २०१६ नंतर परिस्थिती बदलत असताना बंगला, गाडी, शेत, दागिने यांची भर न करता दहा गावात अभ्यासिका उभारणे म्हणजे समाजऋण फेडणारे काम. समाजसेवा करणेसाठी गर्भश्रीमंत असावे लागते असं काही नसतं. मनाची श्रीमंती व दानत महत्वाची असते.

गजानन जाधव. औरंगाबाद, वैजापूर येथील तलाठी महसूल विभागासाठी नक्कीच एक आदर्श आहेत. डिपार्टमेंट कोणतेही असो प्रत्येक विभागात भ्रष्टाचारी जसे असतात तसे मानवतेचे मसीहा व देवदूतही असतातच. लग्न एकदाच होत असते. लग्नात थाटमाट न करता, हौसमौज न करता, डामडौल न‌ करता लग्नात होणारा खर्च समाजासाठी खर्च करणे ही बाबच समाजासाठी दीपस्तंभ ठरते.

…. गजानन जाधव आपणास, आपल्या मातोश्री व सौभाग्यवती तसेच आपल्या भगिनींनाही आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभू दे ही परमेश्वराचे चरणी मनोमन प्रार्थना !! 

लेखक : श्री संपत गायकवाड

(माजी सहायक शिक्षण संचालक)

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कैदी नं आठसो बयालीस… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ कैदी नं आठसो बयालीस… ☆ श्री सुनील शिरवाडकर

माझ्या पुस्तकांच्या संग्रहात एक अनमोल कादंबरी आहे.. तिचं नाव..

‘थॅंक्यु मि. ग्लाड’. अनिल बर्वे यांची ही कादंबरी माझ्या आवडत्या पुस्तकांमध्ये अग्रभागी आहे.. अनेक वेळा ती वाचली आहे.. तिचं कथानक.. वीरभूषण पटनायक, ग्लाड, जेनी ह्या व्यक्तिरेखा.. त्यातील प्रसंग.. संवाद.. सगळं सगळं पाठ झालंय.

तर नुकताच एक लेख वाचण्यात आला.. ही कादंबरी जेव्हा लिहिली गेली.. त्यावेळी काय काय घडलं.. ही सगळीच माहिती या लेखात आहे.. आणि हा लेख लिहीला आहे दिलीप माजगावकर यांनी.

अनिल बर्वे हे नक्षलवादी विचारांचे समर्थक होते.. १९७५-७६ चा तो काळ. बर्वे एक साप्ताहिक चालवत होते.. रणांगण हे त्याचं नाव.. त्यातील काही लेखांमुळे त्यांच्यावर खटले दाखल झाले होते. अटक होऊन तीन चार महिने जेलमध्ये जाणार हे निश्चित होतं. त्यांना अटकेची भीती नव्हती.. काळजी होती पैशाची.. महिना दीड महिन्यात प्रेरणाचं.. म्हणजे बायकोचं बाळंतपण होतं..

तर अशातच ते एकदा श्री. ग. माजगावकर आणि दिलीप माजगावकर यांना भेटले. डोक्यात एका कादंबरीचं कथानक घोळत होतं.. ती कादंबरी म्हणजे हीच.. थॅंक्यु मि. ग्लाड..

त्यांची अपेक्षा होती की.. कोणी प्रकाशकाने दोन हजार रुपये द्यावे.. तुरुंगात ही कारणे पुर्ण करणार होते.

मग माजगावकरांनी मध्यस्थी केली.. आणि रामदास भटकळ यांनी पॉप्युलर प्रकाशनासाठी या कादंबरीचे हक्क घेतले.. अनिल बर्वे यांचा पैशाचा प्रश्न सुटला.

ते जेलमध्ये गेले.. पण चार महिन्यांत कादंबरीची एक ओळही ते लिहू शकले नाही.. कारण?

कारण बर्वेंना जेलमधल्या त्या शांततेत लिहायची सवयच नव्हती.

ते सांगतात..

घरी कसं, लोकांची ये जा.. देणेकऱ्यांचे तगादे.. प्रेरणाची भुणभुण.. या अशा सवयीच्या वातावरणात मला लिहायला जमतं.

जेलमधून बाहेर आल्यावर आठ दिवसांत बर्वेंनी कादंबरी लिहुन काढली. भटकळांकडे गेली.. एव्हाना आणीबाणी सुरू झाली होती.. सेन्सॉरची बरीच बंधनं होती.. त्यात कादंबरीच्या विषय हा असा.

मग ठरलं असं की.. माजगावकर यांच्या ‘माणुस’ मधुन दोन भागात कादंबरी प्रकाशित करायची.. काही अडचणी आल्या नाहीत तर पॉप्युलरनं पुस्तक प्रकाशित करायचं.

‘माणुस’ मध्ये कादंबरी प्रकाशित झाली.. भरभरून प्रतिसाद मिळाला.. अनिल बर्वे हे नाव लेखकांच्या पहिल्या रांगेत जाऊन बसलं.

काही काळाने कादंबरीचं नाट्य रुपांतर झालं.

‘नाट्यसंपदा’ ने ‘थॅंक्यु मि. ग्लाड’ रंगमंचावर आणलं.. प्रभाकर पणशीकर यांचा ग्लाड.. आणि बाळ धुरीचा वीरभूषण पटनायक लोकांना आवडला..

काही काळाने मोहन जोशींचा ग्लाड आणि यशवंत दत्त यांचा वीरभुषण पण लोकांना आवडला. अनिल बर्वेंचं नाव झालं.. हिंदी मराठी चित्रपटांच्या पटकथांकडे ते वळले..

‘थॅंक्यु मि. ग्लाड’ या कादंबरीने आणि नंतर नाटकाने अनिल बर्वे यांना पैसा, प्रसिध्दी सगळं काही मिळालं. आणि या काळातच डॉ श्रीराम लागू यांच्या डोक्यात एक कल्पना आली होती. या कादंबरीवर एक उत्कृष्ट हिंदी चित्रपट होऊ शकतो असं त्यांना वाटतं होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन गुलजार यांनी करावं असंही त्यांच्या डोक्यात होतं.. या संदर्भात डॉ लागु गुलजार यांना भेटलेही होते.. गुलजार यांनी यात रसही दाखवला होता. एकदा बसुन कादंबरीचे कथानक ऐकायचं हेही ठरलं.

गुलजार यांना कादंबरीचं कथानक ऐकवायचं होतं.. पण वेळ जमून येत नव्हती.. इकडे अनिल बर्वे यांना खुप घाई झाली होती. ते डॉ लागुंना म्हणत होते..

“ इतर निर्माते.. म्हणजे राज खोसला, हृषिकेश मुखर्जी माझ्या मागे लागले आहे.. मी त्यांना थांबवुन ठेवलं आहे.. लवकर काय ते ठरवा.. तुमच्यामुळे माझं नुकसान होतंय.. मला पैशाची गरज आहे.. सध्या हजार रुपये तर द्या. ” 

असं दोन तीन वेळा घडलं.. डॉ लागूंनी बर्वेंना वेळोवळी हजार रुपये दिले..

पण नंतर या चित्रपटाची गाडी पुढे गेलीच नाही.. गुलजार आणि डॉ लागुंचं बोलणं काही ना काही कारणाने लांबत गेलं.

डॉ लागु यांनी सगळं ठरवलही होतं..

गुलजार यांचं दिग्दर्शन..

ते स्वतः मि‌. ग्लाडच्या भुमिकेत..

आणि कैदी नं आठसो बयालीस वीरभूषण पटनायकच्या भुमिकेत..

अमिताभ बच्चन..

पण तो योग आलाच नाही 

.. एका सुंदर चित्रपटाला रसिक मुकले.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares