मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मोक्ष… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ मोक्ष… ☆ प्रस्तुती – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

आज मी एक गोष्ट सांगणार आहे. गोष्ट म्हटले की कसे सावरून बसतो, कान टवकारून ऐकतो. आणि माहिती, भाषण म्हटले की सतरंजीचे दोरे काढतो. आता सध्याच्या काळात हे दोरे म्हणजे अंगठ्याने भरकन पुढे ढकलणे (सोप्या भाषेत म्हणजे स्क्रोल करणे).

 श्रावण महिना सुरु झाला की अनेक सण, उत्सव यांना सुरुवात होते. उपास, व्रतवैकल्ये यांना सुरुवात होते. त्यात श्रावणी सोमवार या दिवसाचे खास महत्व असते. कित्येक मंडळी बाकी काही नाही तरी श्रावणी सोमवार आवर्जून करतात. आपल्याला वाटले असेल मी आता श्रावण महिन्याचे महत्व सांगणार की काय? पण तसे नाही हो! हे सगळे तर सर्वांना माहितच आहे. आणि आपल्या कडे शंकराची मंदिरे पण खूप आहेत.

तर माझे पण असेच होते श्रावण महिना आला की मी पण अत्यंत भाविक होते. आणि कोणत्या शंकर मंदिरात दर्शनासाठी जाता येईल, अशी संधी व मैत्रिणी शोधत असते. मागच्या वर्षी असेच मैत्रिणी मिळून ओतुरच्या कपर्दिकेश्वर येथील मंदिरात दर्शनासाठी जाण्याचे ठरवले. तिथले वैशिष्ठ्य लहानपणी पासून ऐकून होतो. त्या वेळी मोठ्या माणसांच्या बरोबर दर्शन घेतले होते. पण ते नंतर विस्मरणात गेले. म्हणून श्रावणी सोमवारी जाण्याचे ठरवले. जायचे म्हणजे थोडीफार माहिती असावी म्हणून आपल्या गुगल बाबांना विचारले तर त्यांनी सचित्र इतिहास समोर ठेवला की! अगदी नावा पासून माहिती सांगितली.

ऐतिहासिक वारसा असणाऱ्या पुणे जिल्ह्यामध्ये अनेक पुरातन अशी शिवमंदिरे आपल्याला पाहायला मिळतात. त्यातील काही मंदिर ही शेकडो वर्षे जुनी आहेत. त्यातीलच एक शिवमंदिर म्हणजे पुणे शहराच्या उत्तरेला जुन्नर तालुक्यातील ओतूर शहरामधील मांडवी नदीच्या तीरावर असणारे कपर्दिकेश्वर मंदिर आहे. या शिवमंदिराला 900 वर्ष जुना इतिहास आहे. या मंदिरामध्ये श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी या ठिकाणी महादेवाची मोठी यात्रा भरते.

तांदळापासून बनवलेल्या आणि एका लिंबावरती उभ्या असणाऱ्या पिंडी’ हे तेथील वैशिष्ठ्य.

या ठिकाणी शिवलिंगावर कोरड्या तांदळापासून बनवलेल्या आणि एका लिंबावर उभ्या असणाऱ्या तांदळाच्या पिंडी भाविकांचे प्रमुख आकर्षण असते. म्हणूनच या ठिकाणी प्रत्येक श्रावणी सोमवारी जवळपास 1 लाखाहून जास्त भक्त दर्शनासाठी येत असतात. या सोबतच श्रावणी सोमवारच्या यात्रेनिमिताने या ठिकाणी कुस्त्यांचा देखील आनंद आपल्याला घेता येतो. सोबतच मंदिराशेजारीच संत तुकाराम महाराज यांचे गुरु बाबाजी चैतन्य महाराज यांचे समाधी मंदिर आहे. महाराष्ट्रातील प्रमुख तीन संजीवन समाधीपैकी ही एक आहे तसेच जगभर प्रसिद्ध असणाऱ्या ‘राम कृष्ण हरी’ या मंत्राचे हे उगमस्थान आहे.

मंदिराचा इतिहास-

श्री बाबाजी चैतन्य महाराज हे या मांडवी नदी तीरावर अनुष्ठानासाठी बसले असता त्यांनी एक वाळूचे शिवलिंग तयार केले होते. शिवलिंग तयार करताना त्यांना त्या वाळूत एक कवडी मिळून आली त्या कवडीत एक शिवलिंग सापडले. संस्कृतमध्ये कवडीला कपर्दीक असे म्हणतात त्यावरून या शिवलिंगाचे कपर्दीकेश्वर असे नामकरण करण्यात आलं आणि सन 1200 च्या शतकात शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. चंद्राकार मांडवी नदी तीरावर निसर्गरम्य परिसरात हे पुरातन भव्य मंदिर वसलेले आहे. शिवलिंगाच्या स्थापनेपासूनच येथील पुजारी यांनी प्रत्येक वर्षी याच शिवलिंगावर कोरड्या तांदळाच्या पिंडी बांधण्यास सुरुवात केली. ती परंपरा आजही सुरू आहे.

सगळे उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात –

  1. पवित्र श्रावण महिन्यातील सर्व सोमवार
  2. महाशिवरात्री
  3. त्रिपुरारी पौर्णिमा
  4. मंदिराजवळ असणाऱ्या बाबाजी चैतन्य महाराजांचा समाधी सोहळा.

ज्या ठिकाणी जायचे त्याची माहिती आधीच घ्यावी आणि तिथे जाऊन आल्यावर आपले अनुभव सांगावेत. असे वाटते.

कपर्दिकेश्वर मंदिराची पूर्ण माहिती घेऊन आम्ही श्रावणी सोमवारी सकाळी लवकर ओतूर येथे पोहोचलो. तेथील जत्रा, मंदिर, तांदुळाच्या पिंडी सगळे बघण्याची उत्सुकता होतीच. जत्रा पण खूप लहानपणी बघितली होती. असे वाटत होते, लवकर पोहोचलो आहोत. एक तासात दर्शन घेऊन लगेच परत येता येईल. गाडीत तर हे पण ठरवत होतो की दर्शन घेतल्यावर अजून कुठे जाता येईल? पण प्रथम मोक्ष दात्याच्या दर्शनाची ओढ होती. म्हणून तिथे पोहोचलो.

तेथे गाडी पार्किंग साठी मोठीच व्यवस्था होती. आणि पार्किंग ते मंदिर हे जवळच साधारण दीड ते दोन किलोमीटर होते. आणि त्या दरम्यान सगळी जत्रा! सगळी दुकाने इतकी मोहात पाडणारी होती. विशेषत: स्त्रियांच्या जिव्हाळ्याचे विषय होते. निरनिराळी ज्वेलरी, स्वयंपाकाची विविध भांडी, पिशव्या, हेअर पिन, क्लिप्स अगदी काय बघू आणि काय नको असे झाले होते. विविध खाद्य पदार्थ होतेच. पण अगदी निग्रहाने सगळी कडे मनावर दगड ठेवून दुर्लक्ष केले. एकमेकींचे हात धरुनच जावे लागले. कारण गर्दीच इतकी होती. आणि त्यात एकमेकींना सांगत होतो, प्रथम दर्शन घेऊ आणि येताना खरेदी करु. कारण पुढे काय होते माहितीच नव्हते.

सगळ्या गर्दीतून वाट काढत कसे बसे मंदिरा जवळ पोहोचलो. साधारण आपण मंदिराच्या आत प्रवेश करताच चप्पल काढतो. आम्ही पण काढणार होतो. पण एकूण गर्दी पाहून दर्शन रांग कुठे आहे ते पहावे म्हणून पुढे गेलो. तर काय सांगावे… दर्शना पूर्वीच मंदिराला प्रदक्षिणा घालावी लागली. आणि चप्पल न काढण्याचा शहाणपणाचा निर्णय योग्य ठरला. आणि जागोजागी चप्पल काढा आणि इथे ठेवा असा दुकादारांचा आग्रह टाळला याचेही समाधान वाटले. मंदिराच्या मागच्या बाजूने ३०/४० दगडी पायऱ्या चढून जायचे होते. तेथेही चप्पल कुठे काढावी ही चिंता होतीच. शेवटी माझी नेहमीची युक्ती कामी आली. चप्पल काढून एका पिशवीत ठेवून ती आपल्या जवळच ठेवावी हे सर्वांनाच पटले आणि तसेच केले. त्या मुळे एक चिंता तर मिटली.

इतके गोल फिरून आल्यावर वाटले आता दर्शन होणार! एका छोट्या दरवाज्यातून आत प्रवेश केला. आणि देव किती दूर आहे याची थोडी कल्पना आली. कारण आत बऱ्याच बांबूच्या काठ्या लावून गोल गोल ओळी फिरवल्या होत्या. सगळ्या ओळी फिरत फिरत २/३ तास फिरलो तरी त्या रांगा संपेचनात. आणि पायात काही नसल्याने खडे चांगलेच टोचत होते. थोडे पुढे गेल्यावर त्याचे गुपित कळले. बरीच माणसे त्या बांबूच्या मधून रांगेत मधे मधे शिरत होती. मग आमचा नंबर कसा लागावा? अशा रांगेत फार गमती अनुभवल्या.

त्या रांगेत शेजारी भेटले. जुन्या मैत्रिणी भेटल्या. छोटी मुले तर मस्त इकडून तिकडून फिरण्याचा आनंद घेत होती. काही चतुर महिला आपली छोटी मुले पुढे पाठवून ( बांबूच्या खालून ) त्या मुलाच्या निमित्ताने पुढे पुढे जात होत्या. आमच्या मनात एकच विचार येत होता. मोक्षदात्याच्या दर्शनाला थोडे कष्ट तर होणारच! असे सहज दर्शन होणार नाही. आणि ती मानसिकता असल्या मुळे सगळ्याचा आनंद घेत होतो. त्यात एक सात्विक महिला भेटली. तिथले झाड त्याची महती, दर्शनाने मोक्षप्राप्ती कशी होते. रांगेत मधे शिरू नये. देवाच्या दारी थोडे कष्ट सोसावे. आपल्या शरीराला कष्ट सोसावे लागले, पायाला खडे टोचले, तहान भूक सहन केली तर ते दर्शन मोक्षाप्रद नेते. तिने स्वतः कोणकोणती ठिकाणे किती शारीरिक कष्ट सोसून पहिली व दर्शन घेतले हे अगदी रंगवून रंगवून सांगितले. तिच्या त्या मोक्षाचा रस्ता दाखवण्या मुळे आम्ही फारच भारावून गेलो. आणि आता तिच्या पाया पडावे अशा विचारात होतो. तेवढ्यात आमचे लक्ष विचलित झाले. थोड्या वेळाने आम्ही मोक्ष दर्शनाचा मार्ग दाखवणाऱ्या महिलेला शोधू लागलो. अचानक ती कुठे गेली कळेचना! काही वेळाने ती महिला आम्हाला कष्ट घेऊन केलेल्या दर्शनाने कसा मोक्ष मिळतो हे पटवून स्वतः मात्र बांबूच्या मधून सगळ्या रांगा ओलांडून ७/८ रांगा पुढे मोक्षदात्याच्या दर्शनाला बरीच पुढे निघून गेली होती.

बऱ्याच रांगा ओलांडल्यावर, बरेच खडे पायात टोचवून घेतल्यानंतर त्या मोक्षदात्याच्या समोर दर्शनाला उभे राहिलो. आणि तो सोहळा, त्या जगप्रसिद्ध तांदुळाच्या पिंडी बघून ४/५ तासाच्या सर्व कष्टाचे सार्थक झाले.

इतके तास तिथे उभे राहिल्या नंतर ती जत्रा, खरेदी सगळे दुर्लक्षित झाले. त्यात एक बरे होते, आपण रस्ता चुकू अशी शक्यता व चालण्याचे कष्ट नव्हते. कारण गर्दीच आम्हाला ढकलून ते काम करत होती. आपण फक्त एकमेकींचे हात धरून उभे राहायचे. पार्किंग पर्यंत गर्दीने आपोआप आणून सोडले. आणि इतके तास झाल्या नंतर इतर ठिकाणी जाण्याचा प्रश्नच नव्हता.

असे मोक्षदात्याचे दर्शन व ती छोटी सहल अगदी अविस्मरणीय झाली.

©  सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मॉम… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ मॉम… ☆ श्री सुनील शिरवाडकर

वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यानं आपल्या पुस्तकांच्या विक्रीचा आढावा घेतला.. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आत्तापर्यंत आपल्या पुस्तकांच्या जवळपास चार कोटी प्रती विकल्या गेल्या आहेत.

मानधनातुन अफाट पैसा कमावणारा हा अब्जाधिश लेखक..

सॉमरसेट मॉम..

आपल्या लेखणीच्या बळावर समाजातील उच्च समजली जाणारी मंडळी त्याच्या स्नेहात होती‌. त्याच वर्तुळात त्याचा वावर होता… भारतात जेव्हा तो आला होता.. तेव्हा तर व्हाईसरॉयचा खास पाहुणा म्हणूनच आला होता. आपल्या प्रचंड इस्टेटीतला काही भाग काढून त्यानं सॉमरसेट मॉम प्रतिष्ठान सुरु केलं. अनेक होतकरु लेखकांना पैसा उपलब्ध करुन दिला..

त्याचं लेखन अतिशय शिस्तशीर.. सकाळी नऊ ते दुपारी एक ही त्याची लिहीण्याची वेळ.. अगदी रोजच्या रोज.. सुट्टी नाही.. सण नाही.. वार नाही.. रविवार पण नाही.. प्रवासात असलं तरीही खाडा नाही..

रोजच्या रोज काय सुचणार? पण नाही.. तो टेबलपाशी जाऊन बसायचाच.. ती एक शिस्तच लावून घेतली होती त्यानं.. काहीच सुचलं नाही तर कागदावर सही करून परत परत गिरवायचा.

मुळचा तो लघुकथा लिहिणारा.. पण त्याने अनेक कादंबऱ्या लिहिल्या.. नाटकं लिहिली.. चित्रपट लेखन केलं.. लेखक म्हणून त्याची प्रतिमा तेजस्वी होती.. पण..

.. पण त्याच्या आयुष्याला एक दुसरीही बाजू होती.

सॉमरसेट मॉम बोलताना अडखळत बोलायचा.. तोतरा.. त्यामुळे त्याच्या मनात न्युनगंड निर्माण झाला होता.. सगळ्यांपासून दुर दुर रहायचा.. खास करुन स्त्रियांपासून..

आणि यातूनच त्याच्यात लैंगिक विकृती निर्माण झाली होती.. त्यानं चार लग्न केली.. पण ती टिकली नाहीत.. सगळेजण आपल्या वाईटावर आहेत असंच त्याचं म्हणणं असायचं.. सगळ्यांबद्दल मनात संशय.. त्यामुळे भांडणं.. ‌मग अवहेलना..

त्याला एक मुलगीही होती. सायरा तिचं नाव.. तिच्याशी तर त्याचं अजिबात पटलं नाही.. तिच्यावर त्यानं नाही नाही ते आरोप केले. ती कशी लबाड आहे.. वाईट चालीची आहे हे तो वारंवार सांगु लागला. एका अमेरिकेन मासिकात त्यानं सायराचं चारित्र्यहनन करणारी लेखमालाच लिहिली.

पण लोकांना ते आवडलं नाही.. त्याच्या नेहमीच्या प्रकाशकांनी पण ते ग्रंथरूपात आणण्यास नकार दिला.

त्याची एक आजी होती.. ती पण थोडंफार लेखन करायची. लहान मुलांसाठी तिनं अनेक छोटी छोटी पुस्तकं तिनं लिहिली होती.. वाटायचं तिला आपल्या नातवानं पण ती वाचावी.

पण सॉमरसेटनं ती कधीच वाचली नाही.. तो तिला भेटतही नसे.. खुप दुस्वास करायचा. आपल्या अगोदर आपल्या घराण्यात कुणी लेखन केलंय याच गोष्टीचा राग त्याच्या मनात कायम होता.

वयोमानानुसार आजी म्हातारी झाली.. अनेक व्याधी तिला जडल्या.. पण मरतेसमयी तिच्या जवळ फुटकी कवडीही नव्हती. ‌पैशाच्या अभावी ती उपचार घेऊ शकली नाही. नव्वदीच्या उंबरठ्यावर असलेली ॲन आजी वाट पाहु लागली.. नातवाची..

.. पण मॉमने तिची घोर उपेक्षा केली. तो तिला भेटायला आलाच नाही.. बेवारस मरणच तिच्या नशिबी होतं.

सॉमरसेट मॉमची ही दोन रुपं. वयाच्या पंचाहत्तरीत त्यानं लेखन थांबवलं.. आणि वयाच्या नव्वदीत आल्यावर त्याला जाणवलं….

…. काय मिळवलं मी? माझं सगळंच चुकत गेलं.. माझं सगळं आयुष्य फुकट गेलं..

आत्महत्येचे विचार त्याच्या मनात चोळु लागले.. पण ती वेळच आली नाही.. ऐश्वर्यसंपन्न असलेला सॉमरसेट मॉम वयाच्या ब्याण्णव्या वर्षी एकाकी अवस्थेत हे जग सोडून गेला.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘मॅरेथॉन – एक सत्यकथा’ – माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती– सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘मॅरेथॉन – एक सत्यकथा’ – माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती– सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

लता भगवान करे 

मॅरेथॉन – एक सत्य कथा

हॉस्पिटलातील कोपऱ्यातल्या बाकावर मिनमिनत्या दिव्याखाली विमनस्क अवस्थेत ती बसलेली असते.

वय वर्षे 65, नांव लता…

रात्र बरीच उलटलेली असते. वर्तमान पत्राच्या कागदात गुंडाळलेली नोटांची पुरचुंडी ती पुन्हा सोडते आणि पैसे मोजत राहते पण काही केल्या 2000 रूपयांच्या वर आकडा जात नाही. नकळत ती आपल्या गळ्यावरून हात फिरवते नंतर दोन्ही कान चाचपते व पुन्हा हिशोब करते आता रोख रक्कम, गळ्यातले मंगळसूत्र आणि कानातल्या बुगड्या धरून सगळी गोळा बेरीज साधारण 25000 रूपयां पर्यत जाते. तिची गरज आणि उपलब्ध रक्कम यात खूपच तफावत असते असते. हे अंतर कस मिटवायचं याचा विचार करून करून ती थकते आणि त्या ग्लानीतच कधीतरी तिचा डोळा लागतो.

अचानक अंब्युलन्सच्या सायरनचा आवाज होतो तशी ती दचकून जागी होते. कुणाचीतरी डेड बॉडी अंब्युलन्समध्ये घातली जाते आणि काळाकुट्ट धुुर ओकत ती अंब्युलन्स अंधाराच्या कुशीत हरवून जाते. कुठतरी गावठी कुत्र भेसूर रडतं तस तिच्या छातीत धस्स होत. धावतच ती ICU च्या दरवाजापाशी येते आणि त्यावर लावलेल्या काचेतून आत डोकावते. पांढऱ्याशुभ्र बेडवर तिचा नवरा जीवन-मृत्यूच्या उंबरठ्यावर पहुडलेला असतो. क्षणभर ती पांडुरंगाला हात जोडते “देवा, माझं उरलंसुरलं सार आयुष्य माझ्या नवऱ्याला लाभू दे रे!” अशी आर्त प्रार्थना करत रिसेप्शन काऊंटरकडे धावते. समोरच्या नर्सला पुन्हा विचारते “मॅडम, नक्की किती खर्च येईल ह्यांच्या उपचाराला?”. तिच्या रोजच्या प्रश्नाला नर्स शांतपणे तेच उत्तर देते…

“हे बघा आजी, सरकारी योजनेतून त्यांच ऑपरेशन केलं तरी त्यासाठी किमान लाख ते सव्वा लाख रूपये खर्च येईल आणि डॉक्टर म्हणालेत की, हे ऑपरेशन पंधरा दिवसात झालं तर ठीक नाही तर… ” 

पुढचं काही ऐकण्यासाठी ती तिथ थांबतच नाही आणि इतकी मोठी रक्कम आणायची कुठून या विवंचनेत अडकून राहते.

खाजगी कंपनीतून रिटायर झालेल्या तिच्या नवऱ्याची आयुष्याची सारी पुंजी संसाराच्या रहाटगाडग्यात आणि त्यांच्या तीन मुलींच्या लग्नात केंव्हाच संपलेली असते आणि जावयांच्या पु़ढे हात पसरण तिच्या स्वाभिमानी मनाला पटत नसतं.

सगळीकडून फाटलेल्या आकाशाला आयुष्यभर ठिगळं लावता लावता हतबल झालेली ती पुन्हा कोपऱ्यातल्या बाकावर मिनमिनत्या दिव्या खाली येऊन बसते वर्तमान पत्राच्या कागदात गुंडाळलेली नोटांची पुरचुंडी पुन्हा सोडते आणि पैसे मोजत राहते अचानक तिच लक्ष त्या वर्तमान पत्रातल्या जाहिरातीकडे जाते…

शरद मॅरेथॉन स्पर्धाः 

पहिले बक्षिसः रोख रूपये एक लाख…

सकाळ होताच ती तडक चालू लागते. पत्ता शोधत शोधत स्पर्धेच्या आयोजकाच ऑफीस गाठते आणि त्या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेते.

स्पर्धा सुरू होते रोज सराव करणारे हौसे, गवसे, नवसे  स्पोर्ट शूज, कॅप, टी शर्ट आणि बरच काही घालून सज्ज असतात. त्यामध्ये नऊवारी लुगडे नेसलेली “ती”  अनवाणी पायाने उभी असते. सगळा जीव गोळा करून फडफडणाऱ्या झेंडयाकडे पहात असते. कुठेतरी शिट्टी वाजते, हिरवा झेंडा खाली पडतो तशी ती बेभान होऊन वाऱ्याच्या वेगाने धावत सुटते. आता तिच्यापुढे ICU मध्ये जीवन-मृत्यूच्या उंबरठ्यावर शुन्यात नजर हरवून बसलेला तिचा नवरा आणि त्याच्या ऑपरेशनसाठी लागणारी रक्कम एव्हडचं दिसत असतं.

कुठेतरी फट्ट असा आवाज होऊन आडवी बांधलेली लाल रंगाची रिबन ताडकन तुटली जाते तशी ती भानावर येते इकडे-तिकडे पहाते तर तिच्या मागे-पुढे कोणीच नसते आणि समोरची विजयाची कमान फटाक्यांच्या आतषबाजीत तिच स्वागत करत असते…

शरद मॅरेथॉन स्पर्धा तिनं प्रथम क्रमांकान जिंकलेली असते.

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील.. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या लता करे आणि भगवान करे या जोडप्याची ही प्रेरणादायी कथा…

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १२ — भक्तियोग — (श्लोक ११ ते २0) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १२ — भक्तियोग — (श्लोक ११ ते २0) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः । 

सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्‌ ॥ ११ ॥

*

असाध्य तुजला असतील अर्जुना ही सारी साधने

मतीमनाचा जेता होउनी त्याग कर्मफलाचा करणे ॥११॥

*

श्रेयो हि ज्ञानमभ्यासाञ्ज्ञानाद्ध्यानं विशिष्यते । 

ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम्‌ ॥ १२ ॥

*

अजाण अभ्यासाहुनिया खचित श्रेष्ठ ज्ञान

ज्ञानापरिसही अतिश्रेष्ठ परमेशरूप ध्यान

तयापरीही श्रेष्ठतम जाणी त्याग कर्मफलांचा 

त्वरित प्राप्ती परम शांतीची लाभ असे त्यागाचा ॥१२॥

*

अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च । 

निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी ॥ १३ ॥ 

सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः । 

मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः ॥ १४ ॥

*

निस्वार्थी अद्वेष्टी दयावान प्रेमळ क्षमाभाव

ममत्व नाही निरहंकार सुखदुःखसमभाव

योगी सदैव संतुष्ट दृढनिश्चयी आत्मा जयाचा

मतीमनाने अर्पण मजला भक्त मम प्रीतिचा ॥१३, १४॥

*

यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च यः । 

हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः ॥ १५ ॥

*

कुणापासुनी नाही पीडा कोणा ताप न देय

मोद मत्सर नाही भय उद्वेग मला भक्त प्रिय ॥१५॥

*

अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः । 

सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः ॥ १६ ॥

*

निरपेक्ष मनी चतुर तटस्थ शुद्ध अंतर्बाह्य 

दुःखमुक्त निरभिमानी भक्त असे मजसी प्रिय ॥१६॥

*

यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति । 

शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः ॥ १७ ॥

*

हर्ष ना कधी शोकही नाही ना थारा द्वेषा इच्छेला

शुभाशुभ कर्मांचा त्याग भक्तीयुक्त तोची प्रिय मला ॥१७॥

*

समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः । 

शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः ॥ १८ ॥

*

शत्रू असो वा मित्र मान  असो अपमान अथवा

विचलित होई ना मनातुनी  जोपासे समभावा

शीतउष्ण सुखदुःख असो समान ज्याची वृत्ती

साऱ्यापासून अलिप्त राही कसलीच नसे आसक्ती ॥१८॥

*

तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित्‌ । 

अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः ॥ १९ ॥

*

निंदा कोणी अथवा वंदा मनातुनीया स्थित

प्राप्त तयात निर्वाह करूनी सदैव राही तृप्त 

निकेताप्रती उदासीनता कशात ना आसक्त

अतिप्रिय मजला जणुन घ्यावे स्थिरबुद्धी भक्त ॥१९॥

*

ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते । 

श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रियाः ॥ २० ॥

*

धर्मामृत सेवन करती निष्काम प्रेमभावना 

श्रद्धावान मत्परायण भक्तप्रीती मन्मना ॥२०॥

*

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे

श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः ॥ १२ ॥

 

ॐ श्रीमद्भगवद्गीताउपनिषद तथा ब्रह्मविद्या योगशास्त्र विषयक श्रीकृष्णार्जुन संवादरूपी भक्तीयोग नामे निशिकान्त भावानुवादित द्वादशोऽध्याय संपूर्ण ॥१२॥

 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “याला म्हणतात नशीब ”… लेखक : श्री द्वारकानाथ संझगिरी ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “याला म्हणतात नशीब ”… लेखक : श्री द्वारकानाथ संझगिरी ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

पुण्यात जन्मली, आई-वडिलांनी अनाथालयात सोडलं, तीच मुलगी बनली ऑस्ट्रेलियाची कॅप्टन.

नियती आणि नशिबापेक्षा कोणी मोठं नसतं. एखादी गोष्ट नियतीच्या मनात असेल, तर ती घडून राहते. राजाच्या घरात जन्माला येऊनही, एखादी व्यक्ती कमनशिबी ठरते. पण तेच रस्त्यावर जन्मलेलं एक अनाथ मुल ही मोठं इतिहास घडवून जातं. जेव्हा आपल्याला हे समजतं, तेव्हा नियती आणि नशिबाच्या पुढे काही चालत नाही, ही गोष्ट आपल्या लक्षात येते.

पुण्यासारख्या मोठ्या शहराच्या एका कोपऱ्यात जन्मलेल्या अनाथ मुलीची ही गोष्ट आहे. कारण जन्मानंतर आई-वडिलांनी अडचणींमुळे तिला शहरातील अनाथालयात सोडलं होतं. पण नियतीने या मुलीच्या नशिबात काहीतरी वेगळच लिहून ठेवलं होतं. आज या मुलीला जन्म देणारे आई-वडील आतल्या आत भरपूर रडत असतील, कारण ते आज जन्म दिलेल्या मुलीला भेटू शकत नाहीत.

ही गोष्ट आहे, ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध यशस्वी क्रिकेटपटू (Lisa Sthalekar) लीजा स्टालगरची.

१३ ऑगस्ट १९७९ रोजी पुणे शहरातील एका छोट्याशा कोपऱ्यात लीजाचा जन्म झाला. लीजाचा स्वीकार करणं, तिच्या आई-वडिलांना शक्य नव्हतं, ही मुलगी म्हणजे आपल्यासाठी अडचण आहे, असं त्यांना वाटलं. त्यामुळे सकाळी सकाळी त्यांनी पुण्यातील श्रीवास्तव अनाथालयात या मुलीला सोडलं. अनाथालयाने या गोंडस मुलीचं लैला असं नामकरण केलं.

त्या दिवसांमध्ये हरेन आणि सू नावाचं एक अमेरिकन जोडपं देश भ्रमंती करण्यासाठी भारतात आलं होतं. या जोडप्याला पहिल्या पासून एक मुलगी होती. भारतात एका मुलाला दत्तक घेण्याच्या उद्देशाने हे जोडपं इथे आलं होतं. ते सुंदर मुलाच्या शोधात आश्रमात आले. त्यांना मनासारखा मुलगा मिळाला नाही. त्यावेळी ‘सू’ ची नजर लैलावर पडली. त्या मुलीच्या निरागस चेहरा आणि आकर्षक डोळ्यांनी हरेन आणि सू ला तिच्या प्रेमात पाडलं.

कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांनी लैलाला दत्तक घेतलं. ‘सू’ ने लैलाच नाव बदलून ‘लीज’ केलं. ते पुन्हा अमेरिकेला निघून गेले. काही वर्षानंतर हे जोडपं ऑस्ट्रेलिया सिडनी येथे स्थायिक झालं.

हरेनने लीजला क्रिकेट खेळायला शिकवलं. घरातील पटांगणातून लीजने क्रिकेट सुरु केलं. नंतर पुढ जाऊन ती गल्लीतल्या मुलांसोबत क्रिकेट खेळू लागली. लीजला क्रिकेटचा प्रचंड वेड होतं. पण तिने तिच्या शिक्षणाला देखील तितकच महत्त्व दिलं. लीजने अभ्यासा बरोबर क्रिकेट प्रशिक्षण सुरु ठेवलं. पुढे तिने ऑस्ट्रेलियातील स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळायला सुरुवात केली. आता लीजपेक्षा तिची बॅटच जास्त बोलत होती.

पुढे जाऊन तिने ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवलं, अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले. प्रत्येक माणूस आपलं नशीब घेऊन जन्माला येतो. आई-वडिलांनी तिला अनाथालयात सोडलं. नियती तिला अमेरिकेत घेऊन गेली.

हीच लीज ऑस्ट्रेलियाची कॅप्टन बनली. आज जगातील महान महिला क्रिकेटपटूंमध्ये तिची गणना होते.

लेखक : श्री द्वारकानाथ संझगिरी 

प्रस्तुती : सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सैनिकांची मावशी… अनुराधाताई – लेखक – श्री निरेन आपटे ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

सैनिकांची मावशी… अनुराधाताई – लेखक – श्री निरेन आपटे ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

अनुराधाताई 

“मी तिरंगा फडकावून येईन किंवा तिरंग्यात झाकून मला आणले जाईल!” अशी प्रतिज्ञा सैन्यातील जवान करतात आणि युद्धभूमीवर आपलं शौर्य दाखवतात. त्यांचं शौर्य घराघरात नेण्याचं काम ‘लक्ष्य’ फाऊंडेशन करत आहे आणि ह्या फाऊंडेशनची स्थापना केली आहे सौ. अनुराधा प्रभुदेसाई ह्यांनी. ह्याच अनुराधाताईंना भारताचा सैनिक ‘ मावशी ‘ नावाने ओळखतो. सैनिकांच्या मावशीचा आणि त्यांच्या कार्याचा हा वेध घेतला आहे निरेन आपटे ह्यांनी.

सीमेवर एक जवान चुकून भूसुरुंगवार पाय पडल्यामुळे जखमी होतो. अनुराधाताईंना ते कळते. त्या काळजीपोटी त्याला फोन करतात. तो फोन उचलून म्हणतो, ” जय हिंद मावशी. मी अगदी फिट आहे. सुरुंगवार पाय पडल्यावर स्फोट झाला आणि माझा एक पाय माझ्या डोळ्यांसमोर आकाशात तुटून उडाला. आणखी काही जखमा झाल्या आहेत, पण मी फिट आहे!” एक पाय गमावलेला जखमी जवान स्वतःला फिट म्हणवतो. ही कथा अनुराधाताई आपल्याला सांगतात आणि आपले डोळे अभिमानाने चमकतात आणि पाणवतातही. भारतीय सैन्य म्हणजे धैर्य आणि शौर्याचं प्रतीक. पण सिनेस्टारच्या कथा जशा आपल्यापर्यंत पोहोचतात तशा ह्या सैनिकांच्या कथा आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. आपण फक्त १५ ऑगस्टला त्यांची आठवण काढतो आणि नंतर विसरून जातो.

अनुराधाताई बँकेत नोकरीला होत्या तेव्हा त्याही फक्त १५ ऑगस्टला सैन्याची आठवण काढायच्या. एकदा त्या कारगिलला पर्यटक म्हणून गेल्या आणि त्या भेटीने त्यांचं जीवन बदललं. तिथे सैनिकांच्या शौर्याच्या कथा ऐकल्या आणि अनुराधाताईंनी मनात ठरवून टाकलं की समाज आणि सैनिक ह्यांच्यात जे अंतर आहे ते मी कमी करेन. त्यातून त्यांनी लक्ष्य फाऊंडेशनची स्थापना केली आणि आज त्या भारतीय सैनिक सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध कार्यक्रम करतात. त्या स्वतः एकेका सैनिकांबद्दल बोलतात तेव्हा अंगावर रोमांच उभे राहतात. मराठी, हिंदी आणि इंग्लिश अशा तिन्ही भाषांमधून त्या बोलतात. तसेच सैनिकांना भेटण्यासाठी, सैनिकांशी बोलण्यासाठी त्या पर्यटकांना लद्दाख, कारगिल इत्यादी ठिकाणी घेऊन जातात. सैनिकांच्या विधवा पत्नीला समाजातून पाठबळ मिळवून देतात. महत्वाचं म्हणजे सामान्य भारतीय सैनिकांच्या पाठीशी आहेत हे सैनिकाला जाणवू देतात.

आपल्या भाषणातून त्या म्हणतात, ” आपण आपल्या घरात सुरक्षित आहोत. कारण तिथे बॉम्ब हल्ले होत नाहीत, शत्रूने माईन्स पेरलेले नसतात आणि कोणीही आपल्यावर स्नाइपरमधून गोळी घालत नाही. आणि आपल्याला हे स्वातंत्र्य मिळत ते सैनिकांमुळे. आपल्याला freedom मिळालं आहे, पण ते free नाही. त्यासाठी मायनस 56 डिग्री तापमानात, रात्रीच्या मिट्ट काळोखात सैनिक पहारा देत आहेत. “

अनुराधाताई बोलू लागल्या की सैन्यातील अनेक किस्से सांगू लागतात. आधी आपल्याला लेफ्टनंट कर्नल गोयलचा फोटो दाखवतात. तो नाच करताना दिसतो. दुसऱ्या फोटोमध्ये तो बुलेटवर दिसतो. पण ह्या फोटोमागचं सत्य काही निराळं असतं. ह्या २५ वर्षाच्या सैनिकाला श्रीनगरच्या भागात जाऊन अतिरेक्यांचा खात्मा करायचं काम दिलेलं असतं. तो तिथे जातो, पण अतिरेक्यांनी पेरलेल्या माईनवर त्याचा पाय पडतो आणि स्फोट होऊन त्याच्या पायाचे तुकडे होतात. त्याला वाचवायला दुसरा शीख सैनिक पुढे येतो तेव्हा हा आज्ञा देतो ” आगे मत आना. नही तो मै कोर्ट मार्शल कर दूंगा”. ही आज्ञा तो देतो कारण आणखी माईन्स दडवलेले असू शकतात आणि त्यात त्या शीख सैनिकाचा जीव जाऊ शकतो. पण तो शीख सैनिकही काही कमी नसतो. तो स्वतःचा फेटा काढतो आणि लेफ्टनंट कर्नल गोयलचा पाय बांधून त्याला दवाखान्यात नेतो. लक्षात ठेवा, शीख माणूस कधीही आपला फेटा उतरवत नाहीत. पण इथे त्याने तो उतरवला, आपल्या साथीदारांचा, एका निडर बहाद्दराचा जीव वाचवण्यासाठी!

लेफ्टनंट कर्नल गोयलच स्वप्न होतं मुलाला फुटबॉल शिकवणं. पाय तुटल्यावर तो मुलाला फुटबॉल कसा शिकवणार? पण परिस्थितीला शरण जाईल तो सैनिक कसला ? गोयलने कृत्रिम पाय लावला आणि तो सैन्यात प्रशिक्षक बनला. धावू लागला, खेळू लागला. पोहू लागला आणि पॅराग्लाईडींगही केलं.

त्याने म्हटलं आहे, “When people doubted my ability to walk, I decided to fly.”

नागालँड हा भारताचा भाग आहे. पण तिथे भारतीय सैन्याचा इतका दुस्वास करत असत की इंडियन आर्मी हे नाव जरी काढलं तरी ठार मारायचे. सामान्य नागालँडकर भारताचा अविभाज्य भाग आहे हे मानायला तयार नव्हते. तरीही एक तरुण भारतीय सैन्यात भरती झाला. सोबत आणखी काही नागालँडच्या तरुणांना आणले. पुढे हा मुलगा लद्दाखमधे युद्धात शहीद झाला. त्याला महावीर चक्र मिळालं. त्याचं हे सीमा नसलेलं काम अनुराधाताई अभिमानाने सांगतात तेव्हा आपला उर भरून आल्याशिवाय राहत नाही. पुढची कथा असते कॅप्टन मनोज पांडेची. कॅप्टन पांडे शहीद झाला. देशासाठी बलिदान देण्याआधी त्याने म्हटलं-एखादं ध्येय इतकं उत्तुंग असतं की त्यात मिळालेलं अपयशही तितकंच उत्तुंग असतं. मनोज पांडे वयाच्या २३ व्या वर्षी धारातीर्थी पडला.

भारतीय सैनिकांच्या लढवय्या वृत्तीचं दर्शन घडवताना त्या १९७१ च्या संघर्षाचा आवर्जून उल्लेख करतात. अनेक सैनिकांनी आपलं बलिदान देऊन बांग्लादेशाची निर्मिती केली. सैनिकांनी एका देशाची निर्मिती केली अशी उदाहरणे फार दुर्मिळ आहेत. हे धैर्य आपल्या सैनिकांनी दाखवलं आहे आणि ही माहिती अनुराधाताईंमुळे आपल्याला कळते. त्यांच्या तोंडून कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला ह्यांचा किस्सा ऐकताना सैनिकांचं मनोबल काय असतं त्याची प्रचिती येते. १९७१ च्या युद्धात आयएनएस खुकरी ह्या बोटीवर महेंद्रनाथ हे कॅप्टन होते. पाकिस्तानच्या पाणबुडीने ह्या बोटीवर हल्ला केला. त्यामुळे बोटीचं नुकसान झालं. बोट बुडायला आली होती. म्हणून कॅप्टन महेंद्रनाथ ह्यांनी बोटीमधील सेलरला दुसऱ्या बोटीवर नेलं. शेवटचा सेलर उरला, त्याला स्वतःच लाईफ जॅकेट दिलं. सगळी बोट रिकामी झाल्यावर ते स्वतः डेकवर सिगारेट पीत शांत बसले आणि बुडणाऱ्या बोटीसोबत समुद्रात विलीन झाले. काही झालं तरी कॅप्टन बोट सोडत नाही ह्या सैनिकी परंपरेला ते जागले. भारतीय सैनिक आपलं कर्तव्य बजावताना स्वतःच्या प्राणापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ समजतात.

कारगिलमध्ये युद्ध झालं तेव्हा पर्वतावर चढाई करणाऱ्या प्रत्येक सैनिकाला माहित होतं की आपला वर जायचा मार्ग आहे, पण आपण पुन्हा खाली कधीही येणार नाही. तरीही ते वीर न डगमगता शत्रूवर तुटून पडले. ह्यात कर्नल थापर ह्यांचा मुलगाही होता. एकदा एका २६ जुलैला अनुराधाताई कारगिल येथे वीर जवानांच्या स्मृतीसाठी बनवलेल्या विजय स्तंभाजवळ उभ्या होत्या. तेव्हा तिथे कर्नल थापरही आले. आपल्या शहीद झालेल्या मुलाला सलामी द्यायला हा पिता तिथे आला होता आणि ताठपणे उभा राहून अनुराधाताईंना म्हणाला, ” बेटा, डोळ्यात अश्रू नाही आणायचे. माझ्या मुलाचं कौतुक करायचं. ” कॅप्टन थापर ह्यांचं धैर्य पाहून आपणही नतमस्तक होतो. त्या धैर्यासमोर कारगिलचा हिमालयही थिटा वाटू लागतो. आज कॅप्टन थापर आपल्या शहीद मुलाने लिहिलेलं शेवटचं पत्र अभिमानाने वाचून दाखवतात. ज्या वयात मुलाला आशीर्वाद द्यायचे त्या वयात ते मुलाला सलामी देत आहेत.

इथे पदमा गोळेंची एक कविता अनुराधाताई म्हणून दाखवतात:

” बाळ, चाललासे रणा घरा बांधिते तोरण,

पंचप्राणांच्या ज्योतींनी तुज करिते औक्षण.

नाही एकही हुंदका मुखावाटे काढणार,

मीच लावुनी ठेविली तुझ्या तलवारीस धार”

सैनिकाचे पालक असे खंबीर असतात. मुलाच्या तलवारीला धार लावून देतात. तो रणातून कदाचित जिवंत येणार नाही हे माहित असूनही!

अनुराधाताईंचं काम पाहून नेव्हीमधील सैनिकांनी त्यांना पाणबुडीमध्ये आमंत्रण दिलं होतं. ती पाणबुडी पाहून त्या थक्क झाल्या. कारण पाणबुडीत हलता येणार नाही अशी जागा होती. तरीही जिथे फक्त १० जण उभे राहू शकतात, तिथे ४२ जण जातात. एकदा ५६ जण गेले आणि तेही तीन महिने. पाणबुडी पाण्यात जाते तेव्हा त्यांचा जगाशी काहीही संपर्क राहत नाही. आपण २४ तास मोबाईल वापरतो आणि हे सैनिक अनेक महिने पाण्याखाली कोणत्याही संपर्काशिवाय कर्तव्य करत असतात. काम करून हे सामान्य माणसांना संदेश देत असतात की तुमच्या उद्यासाठी आम्ही आमचा आजचा दिवस देत आहोत. हे सैनिक लढाई होते तेव्हा फक्त प्राण पणाला लावून नव्हे तर प्राण देऊन लढतात. ते रोज स्वतःचा स्वयंपाक करतात. त्यांच्यातील काही डॉक्टर असतात जे आसपासच्या समाजाच्या आरोग्याची काळजी घेतात, बांधकाम तज्ज्ञ असतात ते डोंगराळ भागात रस्ता-पूल उभारतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते Locवर उभे असतात. तरीही म्हणतात-Romancing Loc…

सैनिकांचं हे कठोर जीवन लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम अनुराधाताई ‘लक्ष्य’ फाऊंडेशनच्या माध्यमातून करत आहेत. त्यासाठी त्यांनी “सैनिक” हे पुस्तक लिहिलं आहे. त्याचा इंग्लिशमध्ये “soldier ” नावाने अनुवादही झाला आहे. हे पुस्तक त्यांनी सैनिकांच्याच हस्ते प्रकाशित केलं. सैनिक समाजाला समजला पाहिजे त्यासाठी ही धडपड आहे. गेली 15 वर्ष अनुराधाताई ही धडपड करत आहे. शिवाजी महाराजांची कवने गाणारे जसे भाट आहेत, तशा त्या सैनिकांच्या भाट बनून काम करत आहेत.

पण त्यांची इच्छा वेगळीच आहे. त्यांना असं वाटतं की समाजाला, सामान्य माणसाला सैनिक इतका समजावा की लक्ष्य फाऊंडेशनच काम बंद व्हावं.

चला, सैनिक समजावून घेऊ आणि अनुराधाताईंचं काम लवकर पूर्ण करू!!

सैनिक आणि त्यांची ही मावशी इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हा लेख पुढे पाठवू शकता.

लेखक : श्री निरेन आपटे

संग्रहिका : सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘आनंदवन प्रयोगवन’ – लेखिका : सुश्री सुलभा तांबडे ☆ माहिती प्रस्तुती– सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

 

☆ ‘आनंदवन प्रयोगवन’ – लेखिका : सुश्री सुलभा तांबडे ☆ माहिती प्रस्तुती– सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

डॉ. विकास डॉ. भारती यांच्या सोबत दोन – तीन तास गप्पा मारल्या नंतर त्यांची खरी ओळख होते. बाबा आमटे यांच्यासारखा वाटवृक्ष असल्यामुळे विकास यांच्या कार्याची ओळख फारशी समाजाला झाली नाही. याची सल त्यांच्या बोलण्यातून जाणवली. पण आनंदवन व सोमनाथ प्रकल्पातील सर्व कल्पकता ही विकास यांची आहे. ते स्वतः अभियंता आहेत.

आनंदवन बाबा आमटेनी सुरु केले ते कुष्ठरोग्यासाठी तिथे त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी विविध प्रकल्प राबविले जातात. प्रचंड मोठा आणि विस्तीर्ण आवार तोही प्लास्टिक मुक्त. कुठेही कसलाही केरकचरा नाही. असं हे आनंदवन आणि तिथे जे जे प्रकल्प राबविले ते समजून घ्यायचे असतील तर “आनंदवन प्रयोगवन “ हे पुस्तक वाचलंच पाहिजे.

पुस्तकाच्या नावाप्रमाणेच इथे अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत, तेही माफक खर्चात व भविष्यातही इतर खर्च करावा लागणार नाही हा दृष्टीकोण ठेवून. स्वयंपाक घरातील बाहेर पडणाऱ्या कचऱ्यापासून गोबर गॅस चालवला जातो. त्यामुळे गॅस खर्च वाचतो. शिवाय त्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जाते. स्वयंपाकघर एकच सर्वांनी तिथेच वेळेत येऊन जेवायचे असा नियम आहे. सर्वच हातांना काम करण्याची संधी असल्यामुळे त्या प्रोजेक्ट चे नाव संधीनिकेतन असे आहे. इथे काम करणाऱ्या लोकांना कुणाला हात नाही, पाय नाही, हात आहे तर बोटं नाहीत, डोळे असून कमी दिसते, कान असून ऐकायला येत नाही तरीही हे सर्व निरंतर कार्यमग्न. अनेक प्रकारच्या वस्तू इथे बनविल्या जातात त्याची विक्रीही केली जाते.

५० भाग माती, ४०भाग वाळू, १०भाग सिमेंट अशा मिश्रणापासुन विटा तयार करून त्या सावलीत वाळवून नंतर ४ ते ५ दिवस पाणी मारून त्या बांधकामाला वापरल्या आहेत. त्यामुळे आजतागायत गळती नाही, पंखा लागत नाही. अगदी कमी खर्चात घरं बांधली आहेत.

सोमनाथ २५० एकराचा शेती प्रकल्प. इतक्या मोठया क्षेत्रात केवळ एकच विजेची मोटार. सभोवताली जंगल असल्यामुळे जमिनीत पाण्याचे प्रमाण आहे. थोड्याश्या उंचवट्यावर पाणी अडवले आहे आणि तिथे बंधारा घातला आहे. हा बंधारा बांधण्यासाठी शेजारच्या खेड्यापाड्यातील सहा महिने प्लास्टिक कचरा, खराब ट्रकच्या मोठ्या टायर  असे गोळा केले. सिमेंट काँक्रीटच्या मिश्रणामध्ये  गोळा केलेला प्लास्टिक कचरा क्रश करून बंधाऱ्यावर ठेवलेल्या टायरमध्ये  भरला. टायरची मांडणी तीन पायऱ्यांप्रमाणे केल्याने पर्यटकांना झऱ्याचा अनुभव घेता येतो. या बंधाऱ्यातील पाणी गुरुत्वाकर्षण शक्तीचा वापर करून सिमेंटच्या बांधलेल्या पाठामधून संपूर्ण शेतीवर फिरवले जाते. या जमिनीचाच 21 एकराचा भाग उंचावर असल्यामुळे तिथे फक्त विजेची मोटर वापरली जाते. या प्रकल्पावरती पोस्ट ऑफिस आहे. इथे कुणाचे पत्र  येत नाही. पण पोस्टात अनेक कष्ट करणाऱ्या लोकांच्या ठेवी   आहेत. शेती कसायला दिली जाते. वाट्याला आलेल्या जमिनीवर आतल्या बाजूला भातशेती व बाहेर तूर लावली जाते. तुरीचे उत्पन्न त्या राबणाऱ्या शेतकऱ्याला. जेव्हा हा प्रकल्प सुरू केला त्या वेळेला या प्रकल्पातील धान्य भाजीपाला लोक घ्यायला कचरत होते. आज तिथे तिथल्या पिकाला प्रचंड मागणी आहे. हेमलकसा व आनंदवन इथली गरज भागल्यानंतर राहिलेला उत्पादित माल विकला जातो.

इथल्या अर्ध्या भागावर जंगल निर्माण केले आहे. दरवर्षी १ मे ते १५ मे उन्हाळी शिबिर घेतले जाते. या शिबिरातील मुलं-मुली नवीन झाडे लावणे, जंगलाची साफसफाई करणे या सर्व गोष्टी करत असतात. त्यामुळे तिथे घनदाट जंगल तयार झाले असून या जंगलात आपल्याला प्राणी देखील आढळतात.

‘गोकुळ‘ हे अनाथ बालकांसाठी चालवले जाते. अंध व मूकबधिरांसाठी देखील येथे शाळा आहेत.

२०० लोकांचा वाद्यवृंद आहे. या वाद्यवृंदाचे अनेक ठिकाणी कार्यक्रम झालेले आहेत. हे सर्व कलाकार कुष्ठरोग बाधित आहेत.

आनंदवन मध्ये सूतकताई, विणकाम, लाकूड काम, पत्र्यापासून विविध वस्तू तयार करणे, संगीत यांचेही शिक्षण दिले जाते. आज तिथे शास्त्र, कला, वाणिज्य व कृषी या चार शाखांचे महाविद्यालय असल्याने आसपासच्या खेड्यातील असंख्य मुलं आनंदवनशी जोडली आहेत.

मुक्तीसदन बरेच रोगी बरे होऊन जातात पण काही तिथेच रेंगाळतात अशांसाठी मुक्तीसदन मध्ये त्यांची राहण्याची सोय केली आहे.

उत्तरायण वृद्धांसाठी वानप्रस्थाश्रम यालाच ज्ञानपेढी असे नाव आहे. मृत व्यक्तीला दफन केले जाते आणि त्यावरती लगेच एक झाड लावले जाते. त्यामुळे तिथे बगीचाच तयार झाला आहे.

 ‘Give them a chance not a charity’ या तत्वानुसार इथे काम सुरु आहे.

हे पुस्तक तर वाचण्यासारखे आहेच पण त्याहीपेक्षा तिथे जाऊन पहाणं हे भारीच आहे.

(..या पुस्तकाचे लेखक आहेत स्वतः श्री. विकास आमटे)

लेखिका : सुश्री सुलभा तांबडे

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कर्तव्य ‘रेखा’ ओलांडताना ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ कर्तव्य ‘रेखा’ ओलांडताना ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

शेगाव रेल्वे स्टेशन. संध्याकाळची शेवटची एक्सप्रेस निघून गेली आणि काही मिनिटांतच फलाट रिकामा झाला. रेखताईंची ड्युटी थोड्याच वेळात ड्युटी संपणार होती. आता युनिफॉर्म बदलून सिव्हिल ड्रेस चढवायचा आणि घराकडे निघायचे अशा विचारात असतानाच त्यांना ती दिसली… फलाटावरील शेवटच्या एका बाकड्यावर काहीशा विचारमग्न अवस्थेत… शून्यात नजर लावून! रेखाताईंनी आपल्या चेंजिंग रुमकडे जाण्याचा विचार बदलला. तिच्याकडे काही पिशवी वगैरे दिसत नव्हती. सोबत कुणीही नव्हते आणि इतक्यात कोणतीही प्रवासी गाडी या स्टेशनवर थांबणार नव्हती… शिवाय ती बाई दोन जीवांची दिसत होती… दिवस भरत आलेले!

ताईंनी तिच्याजवळ जाऊन तिला हटकले तर म्हणाली “आत्या येणार आहे.. तिला घ्यायला आलेय!”. “एक्स्प्रेस तर मघाशीच निघून गेली की तुझ्यासमोरूनच! नाही आली का तुझी आत्या?” त्यावर ती बाई निरुत्तर झाली… तिला बाई म्हणायचं कारण तिच्या गळ्यात असलेलं ते मंगळसूत्र! लग्नाला एका वर्षापेक्षा जास्त दिवस उलटले असतील असं वाटतं नव्हतं. एकोणीस- वीस वर्षांची पोरच ती!

ती खोटं बोलते आहे हे ताईंनी अनुभवाने ओळखलं. तिला जरा जरबेच्या आवाजातच सांगितले… ”घरी जा.. आणि रिक्षेने जा! अशा अवस्थेत तुझं पायी जाणं बरोबर नाही!” 

“कुठे राहतेस?” या प्रश्नावर तिने तिचे राहण्याचे ठिकाण सांगितले. याच गावातल्या स्टेशनवर GRP मध्ये म्हणजे General Railway Police खात्यात खूप वर्षे सेवा करीत असल्याने आणि जवळपास राहत असल्याने ताईंना सारा परिसर चांगलाच माहित होता. सहज चालत जाण्यासारखे अंतर तर नव्हतं.. आणि गर्भारपणात आणि ते ही दिवस भरत आल्याच्या दिवसांत तर नव्हतंच नव्हतं!

   ती पोर हळूहळू पावलं टाकीत स्टेशनच्या बाहेर जायला निघाली. स्टेशनच्या पाय-या उतरून बाहेर पडली आणि तिथेच घुटमळली. ताईंचे तिच्यावर लक्ष होतंच. ती पोरगी काही रिक्षात बसली नाही. ती काही घरी जाण्याच्या मन:स्थितीमध्ये असेल असं दिसत नव्हतं!

ताई स्टेशन सोडून तिच्या मागोमाग निघाल्या. तशी ती फार दूर गेलेली नव्हती. पण आपण तिचा पाठलाग करतो आहोत, असे तिला वाटू नये म्हणून ताईंनी आपला वेग कमी ठेवला होता. अन्यथा तिने भलतंच काही केलं असतं.. अशी शक्यता होती.

ताईंचा सहकारी विशाल जाधव त्याची ड्युटी संपवून स्टेशन बाहेर पडत होता. ताई स्टेशन सोडून बाहेर का पडत आहेत.. आणि ते सुद्धा युनिफॉर्मवर.. हे त्याला समजेना.

नियमानुसार ताईंची जबाबदारी सस्टेशनच्या हद्दीपुरती मर्यादित होती. पण का कुणास ठाऊक आज त्यांना या मर्यादेबाहेर जावंसं वाटलं. असंच होतं त्यांच्याबाबतीत. का कुणास ठाऊक पण काही विपरीत घटना घडायची असली की त्यांचं मन त्या ठिकाणी जा असं सुचवायचं. गेल्या कित्येक वर्षांच्या सेवेत त्यांनी कितीतरी अपघात, आत्महत्या पाहिल्या होत्या. जमेल त्यांना स्वतःहून मदतीचा हात दिला होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जीवापाड मेहनत करून त्या रेल्वे पोलिसात भरती झाल्या होत्या आणि आज हवालदार पदावर पोहोचल्या होत्या. आज यावेळी स्टेशनबाहेर पडताना ताईंनी वरीष्ठांना कल्पना दिली नाही.. कारण एकतर ड्युटी संपली होती आणि तेव्हढा वेळच नव्हता!

त्यांच्यापुढे चालणारी ती पोरगी तिच्या घराच्या रस्त्याकडे वळणार नाही हे त्यांनी ताडले.

“ताई, इकडे कुठं स्टेशन सोडून?” विशालने विचारले. तो तिला ताई म्हणायचा! “ती समोर चाललेली पोरगी बघतलीस का? तिचा काहीतरी भलताच विचार दिसतोय. एक काम कर… तुझ्या अंगावर सिविल ड्रेस आहे. तू तिच्या मागोमाग चाल… मी मागून येतेच.. मला युनिफॉर्म वर बघून तिला संशय येईल! आणि लोकही विनाकारण गर्दी करतील” 

आणि तिला शंका होती तसंच झाली… ती पुढं चालणारी घराच्या दिशेने न वळता गजानन महाराजांच्या मंदिराच्या मागील बाजूने गेलेल्या दुस-या रेल्वे ट्रॅकच्या दिशेने निघालेली होती… त्या मार्गावरून यावेळी ब-याच ट्रेन्स जात-येत असतात… आणि त्याबाजूला तशी कुणाची गजबजही नसते. काही वेळातच अंधार पडणार होता. आता या दोघांनीही आपल्या पावलांचा वेग वाढवला. ती पोरगी सारखी मागे वळून बघत होती… तिला आपण दिसू नये म्हणून ताई एखाद्या आडोशाला जात… आणि पुन्हा पाठलाग सुरू करत. येणा-या जाणा-यांना विनाकारण संशय येऊ नये याची काळजी घेत ते दोघे तिच्या दिशेने निघाले. कारण विनाकारण आरडाओरडा केला असता तर ती पोरगी भेदरली असती आणि काही भलतंच होउन बसलं असतं! त्या पोरीचं लक्ष नव्हतंच. ट्रॅक वरचे दोन्ही बाजूंचे सिग्नल हिरवे झालेले होते… ट्रेन तिथून जाण्याची वेळ झालीच होती.. कोणतीही ट्रेन काही क्षणांत तिथे पोहोचणार होती!  

आता मात्र हे दोघेही पळत निघाले… तिचं लक्ष नव्हतंच.. आवाज देऊनही काही उपयोग नव्हता… विशाल दादाने पुढे धावत जाऊन तिला रुळावर जाण्याच्या आधीच आडवे होऊन तिचा रस्ता रोखून धरला…. तेंव्हा ती भानावर आली! ताई क्षणार्धात तिच्याजवळ पोहोचल्या!

“काय विचार आहे? घरी जायचं सोडून इकडं कशाला आलीस? मरायचंय पोटातल्या बाळाला सोबत घेऊन?” या प्रश्नांची तिच्याकडे उत्तरे होतीच कुठे? डोळे अश्रूंनी डबडबले आणि पाठोपाठ जोराचा हुंदका उमटला गळ्यातून. ताईंनी तिच्या खांद्यावर थोपटले आणि मग तिला स्वतःच्या खांद्यावर डोके ठेवू दिले! 

“शांत हो! काय झालं मला सांगशील? तुझ्या नव-याचा मोबाईल नंबर दे! त्याने तुला असं एकटीला घराबाहेर पडू दिलंच कसं?” एवढ्यात एक मालगाडी भरधाव अप ट्रॅकवरून धडधडत निघून गेली! त्या पोरीनं त्या गाडीकडे एकदा पाहिलं आणि डोळे मिटून घेतले!

बराच वेळ झाल्यावर तिने कसाबसा नव-याचा नंबर सांगितला. ताईंनी आपल्या मोबाईलवरून त्याला कॉल लावला. पलीकडून हॅलो असे काळजीच्या सुरातील प्रत्युत्तर ऐकताक्षणीच ताईचा रागाचा पार चढला…. ”असशील तिथून आणि असशील तसा निघून ये… !” तिचा नवरा होता फोनवर. त्याने कसाबसा ठिकाण विचारले आणि तो बाईकवर निघाला…. ”लगेच पोहोचतो, मॅडम!”

तो पर्यंत त्या बाजूने जाणारे काही बघे तिथे थांबून झाला प्रकार समजून घेण्याच्या प्रयत्नात होते. ताईंनी त्यांना पिटाळून लावले. त्या पोरीचा नवरा पोहोचलाच… घामाघूम होऊन. ती घरातून निघून बराच वेळ झाला होता आणि तो तिला गावभर शोधत होता. ती मोबाईल घरीच ठेवून बाहेर पडली होती.. घरात काहीतरी कटकट निश्चित झाली असावी!

ताईंनी त्याला झापझाप झापलं. या पोरीच्या जीवाला याच्यापुढं काही झालं ना तर पहिलं तुला आत टाकीन.. असा सज्जड दम दिला! “अरे, या दिवसांत व्याकूळ असतात पोरी. त्यांना समजून घ्यायला पाहिजे की नको? तुझ्याही बहिणी असतीलच की लग्न करून सासरी गेलेल्या? त्यांच्या सासरच्यांनी त्यांना असं वागवलं तर चालेल का तुला? तुझ्या घरच्यांना समजावून सांग…. म्हणावं…. ही सुद्धा कुणाची तरी लाडकी लेक आहे!” 

तो खाली मान घालून सारं ऐकून घेत होता. त्याच्याही डोळ्यांत पाणी होतं… आज आपण बायको आणि मूल अशी दोन माणसं गमावून बसलो असतो, याची जाणीव त्याला झालेली दिसत होती. ताईंनी एका कागदाच्या तुकड्यावर स्वतःचा मोबाईल नंबर लिहून तिच्याकडे दिला. “घरी जाऊन आधी तुझ्या मोबाईलमध्ये हा नंबर सेव्ह कर आणि कधी गरज पडली तर विनासंकोच फोन कर.. आणि असा वेडेपणा पुन्हा कधीच करू नकोस…. बाळ झाल्यावर सगळं काही ठीक होईल!” 

त्या पोरीचा नवरा रेखाताईंचे, विशालदादांचे पुन्हा पुन्हा आभार मानून बायकोला बाईकवर घेऊन सावकाश गाडी चालवत तिथून निघाला. ती पोरगी ताईंकडे पहात हात हालवत राहिली… नजरेआड होईतोवर! 

इकडे ताई स्टेशनकडे लगबगीने निघाल्या. ताई स्टेशनबाहेर गेल्याचं कुणाच्या लक्षात आलं नव्हतं. ताईंनीही कुणाला काही सांगितलं नाही.. out of the way आणि out of jurisdiction जाऊन काम करण्याची परंपरा तशी कमीच आपल्याकडे!

युनिफॉर्म बदलून ताई घराकडे निघाल्या! गजानन बाबांच्या मंदिरासमोरून जाताना त्यांनी कळसाकडे पाहून हात जोडले… आणि आरती सुरू झाल्याचा शंख वाजू लागला…. ताईंची सेवा गजानन महाराजांच्या चरणी रुजू झाली होती ! रेखाताईंनी आजवर अशा अनेक लोकांना बचावले आहे. त्यांचे आशीर्वाद त्यांनी प्राप्त केले आहेत. त्याचे एक ताजे उदाहरण म्हणजे रेखताईंचे पती नुकत्याच झालेल्या एका गंभीर अपघातातून अगदी थोडक्यात बचावले आहेत. चांगल्या कर्मांची फळे परमेश्वर आपल्याला देतोच, अशी रेखाताईंची श्रध्दा आहे. त्यांच्या अनुभवांचे संकलन त्या करणार आहेत. सकारात्मक गोष्टींचा प्रसार व्हावा, म्हणून मी हा लेख त्यांच्या संमतीने लिहिला आहे. यात प्रसिद्धी मिळवण्याचा हेतू नाही.

(नुकत्याच केलेल्या शेगाव-पुणे रेल्वे प्रवासात GRP हवालदार रेखाताई वानखेडे नावाच्या कर्तव्यदक्ष अधिकारी महिलेशी संवाद करण्याचा योग आला. त्यांच्याकडून अशा कितीतरी गोष्टी ऐकायला मिळाल्या. प्रसंगी आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर अर्थात ‘आऊट ऑफ वे ‘ जाऊन केवळ माणुसकीच्या भावनेतून समाजाची सेवा करणारी माणसं आपल्या भोवती आहेत, याचा आनंद झाला. त्यांनी सांगितलेल्या अनेक अनुभवांपैकी हा एक अनुभव थोडेसे लेखन स्वातंत्र्य घेऊन सुहृद वाचकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. रेखाताईंना, विशाल जाधव यांना तुम्ही मनातून का होईना… आशीर्वाद, शुभेच्छा द्यालच, कौतुकाचे चार शब्द लिहाल, अशी खात्री आहे ! ) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ यशाची यशस्विता… ☆ संग्राहक – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

?इंद्रधनुष्य? 

☆ यशाची यशस्विता… ☆ संग्राहक – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆

काही वर्षापूर्वी एक माणूस खाकी अर्धी चड्डी घालून मुंबई सेंट्रलच्या डेपोमध्ये गाडीतून उतरला. मालवणहून मुंबईत तो पहिल्यांदाच आलेला असतो….

उतरताच मुंबईने त्याला आपला रंग दाखवला, त्याची पिशवी चोरीला जाते. आता करायचे काय ह्या मायानगरीत? असा प्रश्न त्याच्या मनात आला..

मुंबईत एकमेव माणूस ओळखीचा माणूस आणि आधार तो म्हणजे गंगाधर. खिश्यात पैसा नाही, मग चालत गंगाधरचे घर गाठले. त्याकाळी दुसर्‍याला आधार देण्याची प्रथा होती. दुसर्‍या दिवशी गंगाधरने त्याला ह. रा. महाजनी (लोकसत्ता दैनिकचे संपादक आणि अभिनेता रविंद्रचे वडील)च्या पुढ्यात उभे केले, कारण त्याला नोकरीची गरज होती. या अर्धचड्डीत उभ्या असलेल्या माणसाला महाजनीने नाव, गाव विचारले आणि ते ऐकताच महाजनी म्हणाले, अरे शब्दकोडे सोडवून पाठवतोस तो तूच का.. ?

मग आजपासून शब्दकोडे रोज बनवून देणे, हीच तुझी नोकरी. अश्यातर्‍हेने पोटापाण्याचा प्रश्न तर सुटला होता. पुढे वेळ मिळेल तेव्हा, ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करून त्याने नाव कमावले आणि त्यामुळे त्याची ओळख महाराष्ट्राच्या मान्यवर लोकांबरोबर झाली..

पुढे स्वस्थ न बसता दिनदर्शिका काढली, ती सुरुवातीला दुसर्‍याकडून छापून घेतली, पण नंतर स्वतःची प्रेस काढून, दिनदर्शिका प्रकाशित केली. दिनदर्शिकाचे मागचे पान रिकामे असे, म्हणून त्यावर भविष्य आणि अनेक गृहोपयोगी गोष्टी छापल्या. त्यामुळे दिनदर्शिकेची लोकप्रियता  आणि खप खूप वाढला, मग दुसर्‍या भाषेत पण, दिनदर्शिका छापणे सुरू केले. खूप पैसा मिळवल्यावर दादर इथे एक इमारत विकत घेतली. ज्या इमारतीमध्ये आज पारसी लोक त्याचे भाडेकरू आहेत…

ही यशोगाथा आहे मालवणहून आलेल्या एका मराठी तरुणाची, ज्यांचे नाव आहे…

“कालनिर्णयकार.. “

“आदरणीय ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर” यांची आणि त्यांना सुरुवातीच्या काळात मदत करणारा तो सद्गृहस्थ गंगाधर म्हणजे “कवि गंगाधर महांबरे”..

एका मराठी माणसाची ही यशोगाथा केवळ प्रेरणा मिळावी म्हणून थोडक्यात सादर…

लेखक : अज्ञात 

संग्राहक : श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ महर्षि कृतु… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? इंद्रधनुष्य ?

☆ महर्षि कृतु… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

ब्रह्मदेवाने स्वतः आणखी प्रजा विस्तार करण्यासाठी अनेक ऋषी उत्पन्न केले. त्यांना प्रजापती  ऋषी असे म्हणतात. त्यापैकीच एक कृतु हे प्रजापती ऋषी. ते ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते. ब्रह्मदेवाच्या हातातून त्यांचा जन्म झाला.

ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून त्यांनी दक्ष प्रजापती आणि क्रिया यांची कन्या सन्नती हिच्याशी विवाह केला. उभयतांना बालीखिल्य नावाचे साठ हजार पुत्र झाले. त्या पुत्रांचा आकार अंगठ्याएवढा होता. ते सगळे सूर्याचे उपासक होते. ते सदैव सूर्याच्या रथाच्या समोर आपले मुख करून चालत रहात. सूर्याची स्तुती करत. ते सारे ब्रम्हर्षी होते. त्यांची तपस्या आणि शक्ती सूर्य देवाला मिळत असे.

एकदा महर्षी कश्यप ऋषींनी यज्ञ करण्याचे ठरवले. त्यांनी महर्षी कृतुंना सांगितले ,या यज्ञात आपण ब्रम्हाचे स्थान ग्रहण करा. महर्षी कृतुंनी ते मान्य केले. आपल्या साठ हजार पुत्रांना घेऊन ते यज्ञ स्थळी आले. तेथे देवराज इंद्र आणि कृतूंचे पुत्र यांच्यामध्ये वाद सुरू झाला. महर्षी कृतु आणि महर्षी कश्यप दोघांनी मध्यस्थी केली. कृतुंच्या  पुत्रांनी पक्षी राज गरुडाला महर्षी कश्यपांना पुत्र रूपात देऊन टाकले.

महर्षी कृतुंना दोन बहिणी होत्या . त्यांची नावे पुण्य आणि सत्यवती अशी होती. महर्षी कृतु आणि सन्नती यांच्या एका मुलीचे नावही पुण्य होते.

सर्वप्रथम ब्रह्मदेवांनी एकच वेद निर्माण केला. त्यानंतर महर्षी कृतुंनी वेदांचे चार भागात विभाजन करण्यासाठी त्यांना मदत केली. पुढे वराहकल्प युगात महर्षी कृतुच वेदव्यास या नावाने जन्माला आले.

स्वयंभुव मनु आणि शतरूपा यांचा पुत्र उत्तानपाद. उत्तानपादाचा पुत्र ध्रुव. ध्रुववर महर्षी कृतुंचे खूप प्रेम होते. जेव्हा ध्रुव अपमानित होऊन अढळस्थान मिळवण्यासाठी बाहेर पडला, तेव्हा तो प्रथम महर्षी कृतु यांच्याकडेच आला. कृतु ऋषींनी त्याला विष्णूची आराधना करण्यास सांगितले. देवर्षी नारदांनी पाठिंबा दिला. त्यामुळेच ध्रुवाला अढळस्थान मिळाले. ध्रुवावर खूप प्रेम असल्यामुळे महर्षी कृतु अखेर धृवाकडेच गेले. म्हणूनच आजही ध्रुवताऱ्याच्या जवळ कृतु ऋषींचा  तारा आहे.

पुराणात महर्षी कृतुंबद्दल अनेक कथा आहेत. महर्षी अगस्ती यांचा पुत्र ईधवाहा याला त्यांनी दत्तक घेतले होते. शिवाय महाराज भरतने देवांच्या चरित्राविषयी त्यांना अनेक प्रश्न विचारले होते. महर्षींनी त्यांच्या शंकांचे समाधान केले. अशा या थोर महर्षींना कोटी कोटी प्रणाम.

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares