मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ माऊलींचा हरिपाठ १. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

☆ माऊलींचा हरिपाठ १.… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

☆ 

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी।

तेणें मुक्ती चारी साधियेल्या ।।१।।

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा।

पुण्याची गणना कोण करी।।२।।

असोनि संसारी जिव्हे वेगु करी।

वेदशास्त्र उभारी बाह्या सदा।।३।।

ज्ञानदेव म्हणें व्यासाचिया खुणा।

द्वारकेचा राणा पांडवा घरी।।४।।

विवरण :-

महाराष्ट्रात भागवतधर्माची मुहर्तमेढ संत ज्ञानेश्वरांनी रोवली आणि म्हणूनच  “ज्ञानदेवें रचिला पाया, तुका झालासे कळस” असे म्हटले जाते. 

घर बांधताना आधी पाया खणला जातो, मग पाया बांधला जातो. जितकी इमारत उंच त्या प्रमाणात पायाचा आकार ठरवला जातो. मागील ७०० वर्ष ही ‘इमारत’ दिमाखात उभी आहे आणि जगाला ज्ञान देण्याचे, परंपरा टिकविण्याचे असिधारा  व्रत चालू आहे, म्हणजे हा पाया बांधणारा अभियंता किती कुशल असेल.

आपल्याकडे सर्व संतांना स्वाभाविकपणेच आईची उपमा दिली गेली आहे. आई इतकेच नव्हे, तर त्यापेक्षा खूप जास्त असे सर्व संतांचे आपल्यावर उपकार आहेत. आई लेकराला एक जन्म सांभाळते, तर सद्गुरू शिष्याला मुक्ती मिळवून देईपर्यंत सांभाळतात. 

भक्त  आणि देव यांच्यातील ऐक्य साधणारा दुवा असेल तर तो म्हणजे  संत. एखादवेळेस देव प्रसन्न होणार नाही,पण संतांना मात्र मायेचा पाझर लगेच फुटतो. सर्व संतांनी समाजाचे कल्याण व्हावे म्हणून अपारकष्ट  सोसले, अनेक संतांनी समाजाचे हीत व्हावे म्हणून मानहानी पत्करली, त्यांची समाजाकडून हेटाळणी  झाली, कोणाचा संसार विस्कटला, कोणाला वाळीत टाकण्यात आले, कोणाची गाढवावरुन धिंड काढण्यात आली. परंतु या कृतीचे प्रतिबिंब कोणत्याही संतांच्या साहित्यात आपल्याला आढळत नाही आणि पुढेही आढळणार नाही कारण संत म्हणजे अकृत्रिम मातृभाव आणि वात्सल्य यांचे आगर. पंढरपूरच्या पांडुरंग पुरुष देव असूनही त्याला सर्व संतांनी माऊली केले आणि सर्व संत सुद्धा त्या विठूमाऊलीप्रमाणे विश्वाची माऊली झाले…..! अखंड नामस्मरणाने अनेक शिष्यांनी संतत्व प्राप्त करून घेतले. परमार्थ आचरण करायला अत्यंत सुलभ आहे. त्याचे सामान्य सूत्र पुढील प्रमाणे सांगता येईल.

 “एकतर समोरच्या मनुष्याला आई माना,  संपूर्ण जगाला आपली आई माना, अथवा संपूर्ण जगाची आई व्हा!!”

या पाठात माऊली म्हणतात की देवाच्या दारी क्षणभर उभा राहा म्हणजे तुला चारी अर्थात सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता या चार मुक्तींचा सहज लाभ होईल. माऊलींनी सांगितलेल्या चार मुक्ती कशा आहेत हे आपण दासबोधाच्या आधारे थोडक्यात समजून घेऊ. 

(संदर्भ: दासबोध दशक ४ समास १०)

“येथें ज्या देवाचें भजन करावें | तेथें ते देवलोकीं राहावें । स्वलोकता मुक्तीचें जाणावें । लक्षण ऐसें ॥ २३॥”

{या मृत्युलोकात असताना ज्या देवतेची उपासना माणूस करतो, त्या देवतेच्या लोकांत तो मृत्यूनंतर जाऊन सहतो. स्वलोकता मुक्तीचे लक्षण हे असे आहे.}

“लोकीं राहावें ते स्वलोकता । समीप असावें ते समीपता । स्वरूपचि व्हावें ते स्वरूपता । तिसरी मुक्ती ॥ २४॥”

{त्या देवतेच्या लोकांत जाऊन राहणे याला स्वलोकता म्हणतात. समीप असावे यास समीपता मुक्ती म्हणतात. त्या देवतेचे स्वरूप प्रास होऊन सहाणे याला स्वरूपता मुक्ती म्हणतात. ही तिसरी मुक्ती आहे.}

“देवस्वरूप जाला देही । श्रीवत्स कौस्तुभ लक्ष्मी नाहीं । स्वरूपतेचें लक्षण पाहीं । ऐसें असे ॥ २५॥”

{त्याला विष्णूचे रूप मिळाले तरी त्यास श्रीवत्स, कौस्तुभ मणी व लक्ष्मी यांची प्राप्ती होत नाही. स्वरूपता मुक्तीचे लक्षण हे अशा प्रकारचे आहे.}

“सुकृत आहे तों भोगिती । सुकृत सरतांच ढकलून देती । आपण देव ते असती । जैसे तैसे ॥ २६॥”

{पुण्याचा साठा असेपर्यंत त्या त्या लोकातील भोग भोगावयास मिठ्यात. पुण्याचा पूर्ण क्षय झाला की तेधून ढकलून देतात. मात्र त्या लोकातील देव तेथे तसेच पूर्वीप्रमाणेच असतात.}

“म्हणौनि तिनी मुक्ति नासिवंत । सायोज्यमुक्ती ते शाश्वत । तेहि निरोपिजेल सावचित्त । ऐक आतां ॥ २७॥”

{या तिन्ही मुक्ती नाशिवंत आहेत. सायुज्यमुक्ती ही अविनाशी आहे. ते कसे ते आता सांगतो. चित्त सावध ठेवून ऐकावे.}

*ब्रह्मांड नासेल कल्पांतीं । पर्वतासहित जळेल क्षिती । तेव्हां अवघेच देव जाती । मां मुक्ति कैंच्या तेथें ॥ २८॥”

{कल्पांती ब्रह्मांडाचा नाश होतो. पर्वतासहित भूमी जळून जाईल तेव्हा सगळे देवही जातात. तेव्हा मग तेथल्या मुक्ती कशा राहणार ? }

“तेव्हां निर्गुण परमात्मा निश्चळ । निर्गुण भक्ती तेहि अचळ । सायोज्यमुक्ती ते केवळ ।  जाणिजे ऐसी ॥ २९॥”

{याप्रमाणे कल्पांत जरी ओढवला तरी निर्गुण निश्चळ परमात्मा जशाच्या तसाच असतो. तो नाहीसा होत नाही. त्याचप्रमाणे निर्गुण भक्तीही अचलच असते. तिचाही नाश होत नाही. सायुज्यमुक्ती ही केवळ शाश्वत असते, हे जाणून घ्यावे.}

“निर्गुणीं अनन्य असतां । तेणें होये सायोज्यता । सायोज्यता म्हणिजे स्वरूपता । निर्गुण भक्ती ॥ ३०॥”

{निर्गुण परमात्म्याशी अनन्य असणे हीच सायुज्यता होय. सायुज्यता म्हणजे स्वस्वरूपता. तिलाच निर्गुण भक्ती म्हणतात.}

हे सर्व वाचून सामान्य मनुष्याला प्रश्न पडतो की मी क्षणभरच काय तासंतास देवळाच्या समोर उभा असतो, कारण माझे घर देवळाच्या समोरच आहे, पण मुक्तीचे सोडा, कणभर देखील मन:शांती प्राप्त होत नाही, याला काय करावे ? याचे उत्तर माऊली आपल्याला पुढे सांगत आहेत.

संतांची वचनांचे अर्थ कळण्यासाठी मनुष्याची त्या विषयातील थोडी तयारी असावी लागते. मूल सकाळी शाळेत गेले आणि संध्याकाळी शिक्षण पूर्ण करून घरी आले असे होत नाही. तद्वतच संत साहित्याचे आहे. माऊली आपल्याला देवाच्या दारी उभे राहायला सांगत आहेत. सामान्य मनुष्य देवाच्या दारी याचा अर्थ देवळाच्या दारी असा घेत असतो. म्हणून अभंग वाचता वाचता तो मनाने देवळाच्या दारी जाऊन उभा राहतो, पुढची ओळ वाचतो आणि त्याला त्वरित देवाचे दर्शन व्हावे अशी अपेक्षा असते, पण तसे होत नाही. याला अनेक कारणे आहेत. 

सर्व संतांनी सांगितले आहे की देव सर्वत्र आहे. देव नाही अशी जागाच नाही. जशी हवा नाही अशी जागा नाही, आकाश नाही अशी जागा नाही, तसे देव नाही अशी जागा नाही. थोडक्यात देव सर्वत्र आहे याचे भान ठेवणे, ते निरंतर टिकणे म्हणजे देवाच्या दारी उभे रहाणे. थोडक्यात आपण नित्य देवाच्या दारी उभे आहोत. याची जाणीव देवाला आहेच, परंतु आपल्या डोळ्यांवर मायेचा पडदा असल्याने देव समोर आहे याची जाणीव आपल्याला अत्यंत क्षीण असते. ही जाणीव विकसित करणे महत्वाचे. ते कार्य भगवंत संतांच्या माध्यमातून करीत असतो.

मनुष्य देवळात जातो, तेव्हा तो देवळाबाहेर आपल्या चपला काढून ठेवतो. देवळाचा उंबरठा ओलांडताना आपला मान, अभिमान, प्रपंच बाहेर ठेवून देवाचे दर्शन घ्यावे असे त्यात अभिप्रेत असते, परंतु मनुष्य देवळात एकटा जात नाही, त्यासोबत वरील सर्व सोबती असतात, त्यामुळे देव त्याला दर्शन देत नाही. एक मनुष्य देवळाबाहेर भिक मागतो आणि हा देवळात जाऊन भीक मागतो.

माऊली क्षणभर उभे रहायला सांगतात. कोणतीही गोष्ट क्षणात होत असते. क्षण युगाचा निर्माता आहे असे म्हटले जाते. काळ अनंत आहे, त्यामानाने आपले आयुष्य क्षणभरच!! बर कोणत्या क्षणाला मृत्यू येईल हे मनुष्याला माहीत नसते, तसे कोणत्या क्षणाला सद्गुरू कृपा करतील हे ज्ञात नसते.

उभा असलेला मनुष्य जागा असतो. त्याचे डोळे उघडे असतात, म्हणजे तो नीट पाहू शकतो. उभा मनुष्य सतत सावध असतो. इथे समर्थांची शिकवण आठवते.

“अखंड सावधान असावे | दुश्चित कदापि नसावे ||” थोडक्यात मनुष्याने क्षणोक्षणी अत्यंत सावध राहून सर्वत्र भरून राहिलेल्या देवाची अनुभूती घेण्यासाठी अखंड नामस्मरण करण्याचा प्रयत्न करायला हवा. 

माऊलींनी सांगितल्याप्रमाणे वागले तर आपल्याला त्याला चारी मुक्ती नक्कीच लाभतील. हे संत वचन आहे, ते सत्य असणारच. मग आपल्या मनात प्रश्न होतो, आम्हाला त्याचा लाभ होणार की नाही आणि कसा होणार ? सर्व संत उत्तम शिक्षक असतात. माऊलींनी याचे उत्तर पुढील ओळीत दिले आहे. 

“हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा।पुण्याची गणना कोण करी।।२।।”

माऊली म्हणतात, तू सतत हरिचे नाम घे. त्याची गणना करू नकोस. मनुष्याला जिवंत राहण्यासाठी श्वसन करावे लागते. मग मनुष्य असे म्हणत नाही की आज मी फक्त पाचवेळाच श्वसन करेन, मला कंटाळा येतो, सारखे श्वसन करण्याचा. तद्वतच मनुष्याने सतत नामस्मरण करावे, हरिचे नाम घ्यावे असे माऊली आपल्याला सांगतात. नामयोगी असलेले माझे सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात,

“नाम सदा बोलावे, गावे, भावे जनासी सांगावे”

मुखात नाम येणे किंवा नामस्मरण करावेसे वाटणे हेच मुळात  मोठे पुण्य आहे.  मानव देहधारी असलेला जीवच फक्त नाम घेऊ शकतो, बाकी इतर योनींतील जीवांना 

ही सुविधा उपलब्ध नाही आणि त्यामुळे नाम घेण्यासाठीच जीवाला मनुष्य देह प्राप्त झाला आहेस असे सर्व संत सांगतात. मनुष्याने हे ध्यानात ठेवून अखंड नाम घेण्याचा प्रयत्न करावा. हेच मोठे पुण्य.  

नाम सतत घेतले पाहिजे. वेळ मिळाला की नाम घेतले पाहिजे. असे करता आले तर नामाशिवाय क्षण ही फुकट जाणार नाही. नामस्मरणाला वेळ मिळत नाही ही लंगडी सबब आहे. जेवढा रिकामा वेळ मिळतो तेवढ्या वेळात जरी रोज नामस्मरण केले तरी नामाच्या राशी पडतील. खरोखर आपण रोज किती वेळ फुकट घालवितो. 

नामाचे महात्म्य इतके अपूर्व आहे की, नाम उच्चारणारा व ते ऎकणारा दोघेही उध्दरून जातात. भक्ताचे सर्व दोषहरण करुन नाम त्याला दोषमुक्त करते, म्हणून जड-जीवांना तारणारे नामस्मरणच आहे. एकाच नामस्मरणाची शेकडो-हजारो आवर्तने झाल्यावर आपली स्पंदने त्या देवतेचा आकार घेऊ लागतात. रामाची भक्ती करणारा राम होतो. कृष्णाची भक्ती करणारा कृष्ण होतो. म्हणून मनुष्याने पापपुण्याच्या हिशेबात  न गुंतता नाम घेणे जास्त हिताचे.

जय जय राम कृष्ण हरी !!!! 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जानुझ कोरझाक – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ जानुझ कोरझाक – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर  ☆

दर शिक्षक दिनाला मला पोलंडमधील जानुझ कोर्झाक या शिक्षकाची आठवण येते. शिक्षणतज्ज्ञ आणि बालमानशास्त्राचा अभ्यास असणारा कोर्झाक मुलांसाठी काम करायचा. आई वडील नसलेली १९२ ज्यू बालकांसाठी त्याने बालगृह काढले. त्या बालगृहात त्याने अनेक उपक्रम केले. तो मुलांना शिकवायचा.

जर्मनी ने पोलंडवर आक्रमण केले. 

त्या ज्यू मुले असलेल्या बालगृहाचा ताबा घेतला व ज्यू साठी असलेल्या छळ छावणीत मुलांना नेले. कोर्झाक ला तिथे न थांबण्याची सवलत दिली. पण माझी मुले जिथे राहतील तिथेच मी राहील अशी भूमिका त्याने घेतली. तिथे अतिशय हाल असूनही तो तिथेच राहिला. शेवटी गॅस चेंबर मध्ये त्या मुलांना पाठवण्याचा दिवस आला. कोर्झाक ने मुलांना नवे कपडे घालायला सांगितले. एका लहान मुलाला त्याने कडेवर घेतले व सर्वांच्या पुढे तो चालत राहिला. त्याला पुन्हा जर्मन सैनिकांनी तुम्ही पळून जा अशी सवलत दिली. यापूर्वीही अशी सूचना अनेकदा दिली. पण माझी मुले तुम्ही मारणार असाल तर मग मलाही मारा असे त्याने सांगितले आणि गॅस चेंबर मध्ये  त्याने मृत्यू पत्करला…

मुलांवर इतके प्रेम करणाऱ्या या शिक्षकाला शिक्षकदिनाच्या दिवशी सर्वांनी आठवायला हवे…….?

लेखक : हेरंब कुलकर्णी

प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डार्क वेब : भाग – 8 ☆ श्री मिलिंद जोशी ☆

श्री मिलिंद जोशी

? इंद्रधनुष्य ?

 ☆ डार्क वेब : भाग – 8 ☆ श्री मिलिंद जोशी ☆ 

मागील काही भागातून आपण डार्कवेब बद्दल माहिती घेत आहोत. त्यात आपण याचा वापर कोण करते? सरकारचे त्यावर नियंत्रण का नाही तसेच डार्कवेबचा वापर करणे कायद्याने प्रतिबंधित आहे का याचा मागोवा घेतला. आज आपण त्यातीलच एक गोष्ट बघणार आहोत. 

‘रेड रूम’

डार्कवेबचा विषय निघाला आणि रेडरूम बद्दल चर्चा झाली नाही असे सहसा होत नाही. ज्यांना डार्कवेब ही गोष्ट माहिती आहे त्यांना रेडरूम हेही माहित असते. अनेकदा तर लोकांना आधी रेडरूम बद्दल माहिती मिळते आणि नंतर त्याबद्दल जास्त माहिती घेताना डार्कवेब बद्दल माहिती मिळते. 

सर्वप्रथम ही ‘रेडरूम’ काय भानगड आहे ते पाहू. होय… भानगडच. कारण रेडरूम बद्दल तुम्हाला जी माहिती मिळेल त्यानुसार, रेडरूम म्हणजे अशी जागा ज्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीवर अत्याचार केले जातात किंवा त्याची हत्या केली जाते आणि ती घटना अनेक जण मनोरंजन म्हणून बघतात. थोडक्यात WWE मध्ये असते ना, दोन, चार जण एकमेकांना हातात येईल त्या गोष्टीने बदडतात आणि लोकांना ते बघण्यात आनंद वाटतो. इथे फक्त दोन गोष्टी बदलतात. पहिली गोष्ट म्हणजे इथे ज्या व्यक्तीवर अत्याचार केले जातात ती व्यक्ती सहन करण्याशिवाय काहीच करू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळे प्रेक्षक आपल्या घरी डार्कवेब इंटरनेटचा वापर करून आपल्या लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर हे सगळे बघू शकतात. या साठी ते दिलेल्या लिंकवर बीटकॉईन किंवा इतर एखाद्या डिजिटल करन्सीच्या रुपात पेमेंट करतात.

काही वेळेस तर असेही सांगितले जाते की यात तुम्ही दोन पध्दतीने भाग घेऊ शकतात. एक म्हणजे प्रेक्षक म्हणून. आणि दुसरे म्हणजे कोणत्या पद्धतीचा अत्याचार करायचा हे सांगून. हे सगळे लाइव्ह घडत असते, आणि हे बघण्यासाठी लोक हजारो / लाखो रुपये खर्च करतात. 

आता कुणाला असे वाटेल की एखाद्या निर्बल माणसावर अत्याचार करण्यात किंवा पाहण्यात कुणाला काय मजा येत असेल? आणि त्यासाठी कुणी हजारो, लाखो रुपये कुणाला का देतील? हाच विचार माझ्याही मनात आला होता. पण डार्कवेबवर अशा लिंक दिसतात हे मात्र खरे आहे. 

तुम्हाला आता रेडरूम म्हणजे काय हे थोडक्यात माहिती झाले असेल. आता याच्या पुढील प्रश्न. हे खरंच अस्तित्वात आहे का?

माझ्या मते अशा कोणत्याही रेडरूम डार्कवेबवर अस्तित्वात असणे जवळपास अशक्य आहे. का? कारण डार्कवेबचे काम करण्याची पद्धत. याआधीच्या भागात आपण पाहिले आहे की डार्कवेब क्लाइंट आणि सर्व्हर याची ओळख पटणे अवघड व्हावे यासाठी मास्किंग करत असते. त्यातून काही जण VPN चाही वापर करतात. त्यानुसार data अनेक वेगवेगळ्या आयपीवर पाठवला जातो. अशा अनेक ठिकाणाहून फिरत तो क्लाइंट पर्यंत पोहोचतो. इंटरनेटचा स्पीड लक्षात घेता अशा ठिकाणी लाइव्ह स्ट्रीमिंग कितपत शक्य आहे? म्हणजे टेक्निकली हे शक्य वाटत नाही. मग यात शक्यता कोणती असेल? तिथे एखादी लिंक देऊन झूम किंवा गुगलमिट सारख्या ठिकाणी सहभागी करून घेणे. पण इथे डार्कवेब वापरले जात नाही. डीपवेबचा यात वापर होऊ शकतो. ( गुगलमिट, झूम या गोष्टी डीपवेब प्रकारात मोडतात. कारण त्याचा वापर करण्यासाठी ज्याने अशी मिटिंग अरेंज केली असेल त्याची परवानगी लागते. )

रेडरूम बद्दल जर आपण कोणत्याही तज्ञाला विचारले तर त्याचे उत्तर असते, ‘मी याबद्दल ऐकले आहे पण कधीही रेडरूममध्ये गेलो नाही.’

काही जण आता असेही विचारतील की युट्युबवर तर याबद्दलचे अनेक व्हिडिओ दाखवले जातात. ते काय आहे? ते सगळे व्हिडिओ हे मुद्दाम बनवले जातात. किंवा अनेकदा वेगवेगळ्या चित्रपटातील क्लिपला ग्रेस्केल मध्ये ( म्हणजे black & white बनवून ) बदलून पोस्ट केले जातात. त्यामागे पोस्ट करणाऱ्याची मानसिकता ही थोडीशी मस्करी करण्याची किंवा आपल्याला काहीतरी जास्त माहिती आहे हे इतरांना सांगण्याची असते.   

असे सगळे असूनही मग डार्कवेबवर ‘रेडरूम’ बद्दलच्या लिंक का असतात? किंवा चार दिवसात ‘रेडरूम’ सेशन होणार आहे अशी लिंक का आढळते?

याला दोन कारणे आहेत. त्यातील पहिले कारण म्हणजे काही जणांच्या मनात अशा विचित्र भावना निर्माण होत असतात. काहीतरी थ्रिल म्हणून ते अशा ठिकाणी रजिस्ट्रेशन करतात. पैसे भरतात आणि फसले जातात. ज्याला पैसे मिळाले तो नंतर गायब होतो. आपण कुणाला पैसे पाठवले हेच माहिती नसेल तर तुम्ही त्याला पकडणार तरी कसे? म्हणजेच फसवणुकीसाठी अशा लिंकचा वापर अनेक hacker करतात.

याचे दुसरे कारण म्हणजे अशा अनेक लिंक काही देशाच्या सुरक्षा यंत्रणाच बनवत असतात. अशा ठिकाणी जे लोक येतात त्यांची माहिती घेऊन त्यांना अटक केली जाते. हा एक प्रकारचा सापळा असतो. अनेक विकृत लोक या सापळ्यात अडकतात आणि त्यांना योग्य ते शासन किंवा समुपदेशन केले जाते.   

अनेकदा डार्कवेब पेक्षाही विचित्र गोष्टी आपल्या सर्फेस वेबवर बघायला मिळतात. त्याचे साधे उदाहरण म्हणजे काही जण आत्महत्या करताना फेसबुक लाइव्ह करतात. काही गेम असे असतात की त्याचा उपयोग लहान मुलांना आत्महत्या करण्यास किंवा कुणाची हत्या करण्यास प्रवृत्त करतात. अनेक खेळांवर तर सरकारने बंदीही घातली आहे. आणि हे सगळे सर्फेस वेबवर चालते.  

थोडक्यात ‘रेडरूम’ ही गोष्ट डार्कवेबवर प्रत्यक्षात अस्तित्वात असणे जवळपास अशक्य आहे. 

मागील आठ भागांच्या लेखमालेतून डार्कवेब बद्दलची माहिती सोपी करून सांगण्याचा मी प्रयत्न केलाय. पुढेमागे अशीच एखादी लेखमाला परत घेऊन येईन, तो पर्यंत रामराम… धन्यवाद…

©  श्री मिलिंद जोशी

वेब डेव्हलपर

नाशिक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डार्क वेब : भाग – 7 ☆ श्री मिलिंद जोशी ☆

श्री मिलिंद जोशी

? इंद्रधनुष्य ?

 ☆ डार्क वेब : भाग – 7 ☆ श्री मिलिंद जोशी ☆ 

(ही अतिशय महत्वपूर्ण माहिती देणारी लेखमाला दर सोमवारी आणि मंगळवारी प्रकाशित होईल) 

मागील एका भागात मी म्हटले होते की, डार्कवेबला सगळ्यात जास्त फंडिंग अमेरिकन सरकार तसेच गुगल सारख्या काही कंपन्या करतात. आता अमेरिकन सरकार जर फंडिंग करत असेल तरी त्याचे नियंत्रण का नाही? याचे कारण आहे नेटवर्कची काम करण्याची पद्धत.

ज्यावेळी दोन किंवा त्यापेक्षा जास्त कॉम्प्युटर / मोबाईल किंवा इतर काही डिव्हाईस एकमेकांशी जोडले जात असतील तर त्याला नेटवर्क असे म्हणतात. अशा ठिकाणी एक कॉम्प्युटर हा माहिती मागवणारा आणि दुसरा माहिती पुरवणारा असतो. जो माहिती मागवतो त्याला क्लाइंट असे म्हणतात तर जो माहिती पुरवतो त्याला सर्व्हर असे म्हणतात. वेब कोणतेही असो, सर्फेस / डीप किंवा डार्क, त्याचे कामही असेच चालते.

सर्फेस वेबसाठी वापरले जाणारे सर्व्हर हे फिक्स असतात. ते कोणत्याही कंपनीचे असोत, त्याची नोंद डोमेन रजिस्टर करणाऱ्या ठिकाणी केलेली असते. म्हणून तर गुगलचे मेल याहूला जाऊ शकतात. किंवा रेडीफमेल वरून जीमेलवर मेल पाठवणे शक्य होऊ शकते. अशा ठिकाणी नियंत्रण ठेवणे शक्य असते. पण या उलट डार्कवेबचे असते. इथे निर्माण होणाऱ्या कोणत्याही सर्व्हरची नोंद कुठेही नसते. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही.

एक उदाहरण देतो. आजकाल आपण टीव्हीवर अपहरण कथा बघतो. त्यात अपहरण करणारे गुंड फोन करण्यासाठी एक साधा फोन घेतात, एक खोट्या नावाने सीम घेतात. त्यानंतर एखाद्या मुलाचे अपहरण करतात आणि त्या खोट्या नावाने विकत घेतलेल्या सीमवरून अपहरण केलेल्या मुलाच्या घरच्यांना फोन करतात. एकदा का त्यांना पैसे मिळाले की ते विकत घेतलेले सीम तोडून फेकून देतात. अशा वेळी पोलिसांना त्या गुंडांना पकडणे अवघड बनते. तीच गोष्ट इथेही असते. तिथे पोलीस गुंडांना पकडू शकतात कारण त्यात पैशाची देवाण घेवाण प्रत्यक्षपणे केली जाते. इथे तर व्यवहार देखील बीटकॉईन सारख्या क्रिप्टोकरन्सी मध्ये केले जातात. मग त्यावर नियंत्रण ठेवणार कसे?

अजून एक उदाहरण देतो. अनेकांनी नेटवर्किंगच्या LAN ( Local Area Network ) या प्रकाराबद्दल ऐकले असेल. मोठ्या कंपन्या किंवा ऑफिसमध्ये हा प्रकार अनेकांना बघायला मिळेल. तिथे एक सर्व्हर असतो त्यावर software install केलेले असते. त्याला इतर कॉम्प्युटर ( क्लाइंट ) जोडलेले असतात. क्लाइंटवर तुम्ही केलेले काम सर्व्हरवर सेव्ह होते. समजा अशा ठिकाणी तुम्ही एका क्लाइंटवरून दुसऱ्या क्लाइंटला काही संदेश पाठवला तर तो सरकारी यंत्रणेला माहिती होईल का? नाही होणार, कारण इथे इंटरनेटचा वापर झालेला नाही. LANचा वापर झालेला आहे. अशीच काहीशी गोष्ट डार्कवेब बाबतही लागू होते. उद्या समजा मी माझ्या कॉम्प्युटरवर एखादी .onion साईट बनवली आणि त्याची लिंक तुम्हाला पाठवली, आणि आपले कॉम्प्युटर इंटरनेटशी जोडलेले असतील तर तुम्ही त्या लिंकच्या आधारे माझ्या कॉम्प्युटरवरील ती साईट बघू शकाल. यावेळी तुमचा डिव्हाईस हा क्लाइंट असेल आणि माझा कॉम्प्युटर हा सर्व्हर. पण ज्यावेळी मी माझा कॉम्प्युटर बंद करेन, लिंक काम करणार नाही. इथे इंटरनेटचा वापर फक्त दोन डिव्हाईस जोडण्यासाठी केला आहे. अशा वेळी सरकारला आपल्यात काय संदेश दिले घेतले गेले हे आपल्या दोघांपैकी कुणा एकाच्या डिव्हाईसला hack केल्याशिवाय किंवा आपले डिव्हाईस त्यांच्या ताब्यात घेतल्याशिवाय समजू शकणार नाही. समजा माझा कॉम्प्युटर सरकारी यंत्रणेने hack केलाच आणि त्यावेळी मी VPN (Virtual Private Network) वापरत असेल तर जोपर्यंत सरकारी यंत्रणा माझ्यापर्यंत पोहोचतील, मी माझे स्थान बदललेले असेल. हीच गोष्ट आहे की डार्कवेबवर कोणतेही सरकार नियंत्रण ठेऊ शकत नाही.

आज आपण इथेच थांबू, पुढील भागात आपण डार्कनेटवरील ‘रेड रूम’ या प्रकाराबद्दल जाणून घेणार आहोत… तोपर्यंत रामराम…

 

क्रमशः भाग सातवा

©  श्री मिलिंद जोशी

वेब डेव्हलपर

नाशिक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ योग्य लेखन — लेखक : श्री अनिल विद्याधर आठलेकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

योग्य लेखन — लेखक : श्री अनिल विद्याधर आठलेकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

बोलत असताना किंवा लिहिताना केवळ शब्दच नाही तर अंकदेखील आपण चुकीचे उच्चारतो. नक्की कोणता आणि कसा उच्चार योग्य आहे हेच अनेकदा माहीत नसतं त्यामुळे असं होतं. 

उदाहरणार्थ –  

१९ = एकोणवीस ❎❎❎

        एकोणीस ✅✅✅ 

४४ = चौरेचाळीस  ❎❎❎

         चव्वेचाळीस  ✅✅✅

७८ = अष्टयाहत्तर/अष्टयात्तर ❎❎❎

          अठ्ठयाहत्तर ✅✅✅

८८ = अष्टयाऐंशी  ❎❎❎

          अठ्ठयाऐंशी  ✅✅✅

९५ = पंच्यांण्णव  ❎❎❎

          पंचाण्णव  ✅✅✅

(संदर्भ : महाराष्ट्र  शासन, ०६ नोव्हेंबर २००९ च्या आदेशानुसार )

क्रमवाचक संख्याविशेषणांच्या बाबतीत एक महत्त्वाचा उल्लेख –   

पहिली चार क्रमवाचक संख्याविशेषणे अनियमित आहेत – 

– पहिला/ली/ले/ल्या 

– दुसरा /री/रे/र्‍या 

– तिसरा/री/रे/र्‍या

– चौथा/थी/थे/थ्या  

पाच अंकापासून मात्र पुढील सर्व अंकांना ‘वा’ हा प्रत्यय लागतो. 

उदाहरणार्थ – पाचवा, सातवा, बारावा इ. 

#महत्त्वाचा उल्लेख – 

ज्या अंकात उपान्त्य ( सोप्या भाषेत – शेवटच्या अक्षराच्या आधीचं ) अक्षर दीर्घ (‘ई’) तर उपान्त्य अक्षर म्हणजेच ‘ई’ स्वर असणारे अक्षर र्‍हस्व होईल. 

उदाहरणार्थ – 

एकोणीस – एकोणिसावा 

वीस        – विसावा 

बावीस     – बाविसावा 

(संदर्भ – मराठी शब्दलेखनकोश, प्रा. यास्मिन शेख)

तसे साधेच नियम आहेत, पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 

मराठी आपली मातृभाषा आहे असं आपण म्हणतो. ती अभिजात भाषा म्हणून घोषित झाली पाहिजे अशीही आपली अपेक्षा असते, पण आपल्याच भाषेतील अशा छोट्या-छोट्या चुका टाळण्याच्या दृष्टीने आपण काही खास असे प्रयत्न करतो का? 

बघा, विचार करा. 

लेखक : श्री अनिल विद्याधर आठलेकर

प्रस्तुती :  श्री सुहास सोहोनी

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डॉ. आनंदीबाई जोशी… भाग – २ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ डॉ. आनंदीबाई जोशी… भाग – २ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

३१ मार्च… भारताच्या पहिल्या एम. बी. बी. एस. महिला वैद्य अर्थात लेडी डॉक्टर म्हणून प्रचंड गाजलेल्या मराठमोळ्या डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा जन्मदिन

जन्म: ३१ मार्च १८६५, पारनाका, कल्याण.

मंडळी, कल्पना करा आज आपण आपले अपत्य परदेशी जायला निघाले, विशेषतः मुलगी जात असेल तर किती चिंताक्रांत होतो? साधे पुण्याहून मुंबईलाही आज आपण मुलीला एकटे पाठवत नाही. १२५ वर्षापूर्वीचा हा इतिहास वाचा. मुलींना साधे प्राथमिक शाळेतही पाठवत नव्हते त्या काळी आनंदीबाईनी एवढे धाडस केले, काय सोपी गोष्ट आहे? त्यात आनंदीबाई पूर्ण शाकाहारी होत्या, नऊवारी पातळ हाच आनंदीबाईंचा पोशाख होता. जहाजावर देखिल आनंदीबाईची खूप उपासमार झाली. फक्त बटाटा वेफर्स आणि मिळाली तर फळे यावर आनंदीबाईनी दोन महिने काढले, कारण बाकी सर्व पदार्थात काहीना काहीतरी मांसाहारी पदार्थ मिसळल्याचा वास आनंदीबाईंना यायचा. यातच आनंदीबाईंना आजारपण आलं. पुढे अमेरिकेतसुद्धा ४ वर्षे आनंदीबाईंची उपासमारच झाली. भारतीय पद्धतीचं अन्न आनंदीबाईंना कधीच मिळालं नाही. परदेशी कपडे वापरायचे नाहीत म्हणून आनंदीबाई नऊवारी पातळ नेसून धाबळीचे जाड पोलकं घालत असत. अमेरिकेतली बर्फाळ थंडी आनंदीबाईचं शरीर चिरत होती. पुन्हा यात कठीण अभ्यास, स्वत:चा स्वयंपाक स्वत: करणे, समाज-नातलगांची दूषणं सहन करणे हे सर्व सोसून आनंदीबाई आपलं साध्य कार्य करत होत्या. अमेरिकेतही आनंदीबाईंना कुत्सित वागणूक मिळाली. तिथे फक्त कार्पेंटरबाई आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या अशा काही चांगल्या महिला सोडल्या तर बऱ्याच जणांनी आनंदीबाईना खूप त्रास दिला. प्रवासात सुद्धा जहाजावर पुरुषांच्या वासनेच्या नजरा आनंदीबाईना नकोसं करून टाकत असत. जिच्या सोबतीने आनंदीबाई हे सर्व साध्य करण्यास निघाल्या होत्या, त्या अमेरिकन बाईचं वागणंही ठीक नव्हतं. या सर्वाचा आनंदीबाईच्या मनावर व शरीरावरही दुष्परिणाम होत गेला. सतत अर्धपोटी राहिल्याने आजारपण आनंदीबाईंच्या पाठी लागलं. भारतातले कर्मठ लोक तर म्हणत असत की आता आनंदी ख्रिस्ती होऊनच येईल. हाडं चघळायला लागेल. अमेरिकेत आनंदीबाईच्या सहवासात येणाऱ्या मिशनरीज त्यांना ख्रिस्ती हो असा उपदेश करीत. पण स्वदेश, स्वपोशाख (नऊवारी पात्तळ-पोलकं), पूर्ण शाकाहारीपण, पूर्ण मराठी पद्धतीचं आचरण, उपास तापास याची घट्ट बांधिलकी हे सर्व आनंदीबाईंनी कधीच सोडलं नाही. हिंदू आणि मराठी संस्कृतीशी आनंदीबाईंनी कधीच प्रतरणा केली नाही. आज जे आनंदीबाईंचं छायाचित्र सर्वत्र प्रसिद्ध केलं जातं ते गुजराथी पद्धतीने नेसलेली साडी आणि दागिने घातलेलं चित्र दिसते. त्याबद्दल स्वत: डॉ. आनंदीबाईंनी लिहिलं आहे की इथल्या हवेत वारंवार फरक होत राहतो. नऊवारी कासोटा घातल्याने पाय थोडेसे उघडे पडतात. यासाठी पाचवारी गुजराथी पोशाख मी स्वीकारला. तो घातल्याने डोके व सर्व शरीर झाकले जाते. एकूणच पोशाखाबद्दल आनंदीबाईनी आपल्या पत्रात सविस्तर लिहिलं आहे. १६ नोव्हेंबर १८८६ दिवशी आनंदीबाई जेव्हा भारतात परतल्या तेव्हा त्यांना पहायला मुंबई बंदरात लोकांनी तुफान गर्दी केली होती. आनंदीबाईंचं स्वागत पुष्पवृष्टीनं करण्यात आलं. मुंबई बंदरात बोटीतून उतरण्यापूर्वीचं आनंदीबाईंच्या पोशाखाचं वर्णन असं आहेः नारायणपेठी काळी चंद्रकळा (नऊवारी), खणाचं पोलकं, कपाळावर चंद्रकळा, नाकात नथ, कानात कुडी, पायात बूट व स्टॉकिंग्ज असा थाट होता. आल्या तेव्हा आनंदीबाई आजारीच होत्या, परंतु हिंदुस्थानात घरी जायला मिळणार आणि घरचं मराठमोळं अन्न खायला मिळणार म्हणून आनंदीबाईची प्रकृती तात्पुरती सुधारली होती. आनंदीबाईंना अभिनंदनाच्या तारा, मानपत्रे येत होती. मानपत्रात आनंदीबाईंच्या उच्च शिक्षणाचा गौरव केला गेला. अमेरिकेत ११ मार्च १८८६ रोजी फिलाडेल्फिया येथे आनंदीबाईंना वैद्य विद्यापारंगत ही पदवी आणि पुरस्कार देण्यात आला. भारतातील पहिली महिला डॉक्टर म्हणून सर्व उपस्थितांनी आनंदीबाईंची उभे राहून जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात प्रशंसा केली होती. डॉक्टर होऊन आनंदीबाई स्वदेशी आल्या. पण एव्हाना आनंदीबाईंना क्षयाची बाधा झाली होती. बिगरगौरवर्णीय असल्यामुळे जहाजावर कुणाही परदेशी डॉक्टरने आनंदीबाईंना उपचारही दिले नाहीत. मायदेशी आल्यावर समुद्रोल्लंघन करून आलेली, त्यातून स्त्री डॉक्टर म्हणून इथले वैद्यही आनंदीबाईंचा दुस्वास करत होते,इथले डॉक्टर आनंदीबाईंना तपासूनही पाहात नव्हत. आनंदीबाईंना वयाच्या विशीतच क्षयरोग झाला. अमेरिकेत काॅर्पेंटर कुटूबियांनी आपल्या कुटुंबाच्या स्मशानात (ग्रेव्हयार्ड) आनंदीबाईंचे लहानसे थडगे बांधले. त्यावर आनंदी जोशी एक तरुण हिंदू ब्राह्मणकन्या, परदेशात शिक्षण घेऊन डॉक्टर पदवी मिळवणारी पहिली भारतीय स्त्री अशी अक्षरे कोरून तिचे स्मारक केले. हे सगळे वाचल्यावर डॉ. आनंदीबाई जोशी किती थोर होत्या असं आपल्या मनात निनादत राहतं. आजही ते थडगे पहायला मिळते. काही राष्ट्रभक्त मराठी मंडळी आनंदीबाईंच्या थडग्याला आवर्जून भेट देतात, आदरांजली वाहतात. वयाच्या केवळ १८व्या वर्षी बोटीनं परदेशी जाणारी पहिली स्त्री, हालअपेष्टा सहन करीत वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणारी पहिली स्त्री. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही कुचेष्टा, अवहेलना, अपमान सहन करीत हाती घेतलेले जीवित कार्य जिद्दीने पूर्ण करणारी स्त्री. भारतीय (मराठी) रीतिभाती, शुद्ध शाकाहारी आहार सांभाळणारी, तरीही इंग्रजी भाषा उत्तम आत्मसात करून वैद्यकीय शिक्षण प्रकृती स्वास्थ्य सांभाळीत अभ्यासक्रम पूर्ण करणारी तरुणी. या सर्वाबरोबर पती, नातेवाईक, सुहृद यांना सतत पत्र लिहून त्यांच्याशी संवाद साधणारी डॉ. आनंदीबाई यांच्यावर त्यांच्या समकालीन आणि लेखिका असलेल्या काशीबाई कानिटकर यांनी चरित्र लिहिले आहे. अंजली कीर्तने यांनी संशोधन करून आनंदीबाई या नावाचं एक चरित्र लिहिलं आहे. श्री.ज. जोशी यांनी आनंदीबाईंवर आनंदी गोपाळ ही कादंबरी लिहिली आहे. आनंदीबाईंवर आनंदीबाई हे नाटकही रंगभूमीवर आलं आहे १५०हून अधिक वर्षे झाली तरी डॉ. आनंदीबाई जोशींची वैचारिक संघर्षांच्या संदर्भात भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून आजही वाचकांना, अभ्यासकांना, स्त्रियांना भुरळ पडते.

आनंदीबाई जोशी यांचे २६ फेब्रुवारी १८८७ रोजी निधन झाले. 

आनंदीबाई जोशी यांना विनम्र अभिवादन. 

– समाप्त –

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डॉ. आनंदीबाई जोशी… भाग – १ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ डॉ. आनंदीबाई जोशी… भाग – १ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

३१ मार्च… भारताच्या पहिल्या एम. बी. बी. एस. महिला वैद्य अर्थात लेडी डॉक्टर म्हणून प्रचंड गाजलेल्या मराठमोळ्या डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा जन्मदिन

जन्म: ३१ मार्च १८६५, पारनाका, कल्याण.

मंडळी, काय एकेक रत्ने होऊन गेली या मराठी मातीत. भक्ती, शक्ती, स्वातंत्र्य, कला, नाट्य, चित्रपट, उद्योग, शिक्षण असे कोणतेही क्षेत्र असो मराठी माणसाने कायम आपले पहिले पाऊल टाकले आहे. पण हल्लीचे नास्तिक आणि तथाकथित पुरोगामी नतद्रष्ट राजकारणी या सर्व उच्च व महान व्यक्तींना समाजात जातीपातीचे विष पेरत सामान्य जनतेच्या मनात विशिष्ट जातीत टाकून संपवण्याचे काम करत आहेत. आजच्या उत्सवमूर्ती आनंदीबाई जोशी या त्यापैकीच एक महान व्यक्तीमत्व आहे. कल्याण तालुक्यातील पारनाका गावात सरकारी खात्यात काम करणारे गणपतराव अमृतेश्वर जोशी आणि गृहिणी गंगाबाई जोशी या मध्यमवर्गीय को. ब्रा. दांपत्याच्या पोटी ज्येष्ठ अपत्य म्हणून आनंदी हे कन्यारत्न जन्मले. आनंदीबाईंचे पाळण्यातले नाव यमुना होते. पुढे वयाच्या ९व्या वर्षी २० वर्षांनी मोठे आणि पुण्यातील मुख्य टपाल कचेरीत (सिटी पोस्ट) कारकून असलेले गोपाळराव जोशी या बिजवराशी आनंदीबाई विवाहबद्ध झाल्या. लग्नानंतर गोपाळरावांनी पत्नीचे नाव आनंदी ठेवले. आनंदीबाई १४व्या वर्षी गरोदर राहील्या आणि पोटी एक मुलगा जन्मला. पण दुर्दैवाने पुरेशा वैद्यकीय सोयी उपलब्ध नसल्याने केवळ १० दिवसातच आनंदीबाईंचे बाळ दगावले. या घटनेने प्रचंड व्यथित झालेल्या आनंदीबाई खूप व्यथित झाल्या. हीच खंत आनंदीबाईंना वैद्यकीय शिक्षण घेण्यास कारणीभूत ठरली. पत्नीला शिक्षणाची आवड आहे हे गोपाळरावांनी बरोबर ताडले. त्याकाळी विविध विषयांवर लोकहितवादींची शतपत्रे हे मासिक प्रकाशित व्हायचे. गोपाळराव शतपत्रे नियमित वाचत असत. शतपत्रात आलेल्या एका सदरावरून गोपाळरावांनी प्रेरणा मिळाली आणि त्यांनी पत्नीस इंग्रजीचे शिक्षण देण्याचा निश्चय केला. गोपाळरावांची टपाल खात्यात नोकरी असल्यामुळे त्यांची सतत बदली होत असे. कोल्हापूर, मुंबई, भूज, कलकत्ता, बराकपूर, श्रीरामपूर (बंगाल) इ. ठिकाणी गोपाळरावांच्या बदल्या झाल्या. प्रत्येक वेळी आनंदीबाई पतीसोबत गेल्या. गोपाळराव आनंदीबाईंना शिकवित असत. कोल्हापूरात असताना गोपाळरावांची ख्रिस्ती मिशनऱ्यांशी ओळख झाली. मिशनऱ्यांच्या लोकांशी चर्चा केल्यावर गोपाळरावांच्या मनात आनंदीबाईंना अमेरिकेत पाठवून प्रगत शिक्षण द्यावं असं आलं. तसे तर गोपाळरावांना स्वतःलाही अमेरिकेला जायची इच्छा होती, परंतु त्यांना जमू शकलं नाही. आनंदीबाई अतिशय बुद्धिमान होत्या आणि त्या एकपाठी होत्या. आनंदीबाईंनी इंग्रजीसह अन्य विषय पटकन आत्मसात केले. पण आनंदीबाईंना अमेरिकेत शिकायला जाण्यासाठी पैशांची आवश्यकता होती. त्यामुळे तशी व्यवस्था करण्यात आणि आनंदीबाईंच्याबरोबर कोणीतरी सोबत जायला शोधण्यात गोपाळरावांची २-४ वर्षे गेली. याचा सुगावा समाजात लागला त्यामुळे आनंदीबाईंना समाजात, शेजाऱ्यापाजाऱ्यांत विचित्र आणि विपरीत अनुभव आले. त्याकाळी नवरा बायको असे फिरायला सहसा जात नसत त्यामुळे आनंदीबाई गोपाळरावांबरोबर फिरायला जातात, इंग्रजी शिक्षण घेतात याचे कुतूहल म्हणून या जोडप्याला पाहायला लोक गर्दी करत असत. लोक गोपाळरावांना ठीक ठिकाणी गाठून विचारत असत की तुम्ही ही ठेवलेली बाई आहे का? या सर्व प्रकाराने आनंदीबाईंना खूपच मनस्ताप होत असे आणि अपमानास्पद वाटत असे. परंतु तिकडे दुर्लक्ष करून आनंदीबाई आपला अभ्यास निष्ठेने करत असत. पुढे श्रीरामपूर (बंगालमधलं) येथे असताना गोपाळरावांनी आनंदीबाईना अमेरिकेला पाठवायचं नक्की केले. आनंदीबाईंनी अमेरिकेत जाऊन वैद्यक शास्त्र शिकायचं अस ठरवलं. पण या आधीची घटना विस्मयकारक होती. ते साल होतं १८८०. न्यूजर्सीतल्या रोशेल या गावातील श्रीमती कार्पेंटर या एकदा त्यांच्या दातांच्या डॉक्टरांकडे गेल्या होत्या. तिथे पडलेलं मिशनरी रिव्ह्यू नावाचं मासिक त्यांनी सहज चाळायला घेतलं. त्यात गोपाळराव जोशी व आर.जी. वाईल्डर यांची पत्रं छापून आली होती. त्यावरून कार्पेंटरबाईंना समजलं की गोपाळ जोशी हे आपल्या पत्नीला अमेरिकेत शिक्षणासाठी पाठवायच्या प्रयत्नात आहेत. कार्पेंटरबाईंच्या मनात न पाहिलेल्या आनंदीबद्दल अतीव स्नेहभाव जागृत झाला. त्यावेळी अजून एक विस्मयकारक घटना घडली. कार्पेंटरबाईंना एक नऊ वर्षांची आमी नावाची मुलगी होती. आमी आईला म्हणाली आई, मला स्वप्न पडलं की तू हिंदुस्थानात कुणाला तरी पत्र पाठवत आहेस. कार्पेंटरबाई चकित झाल्या. गोपाळराव जोशी यांना पत्र पाठवण्यापूर्वी कार्पेंटरबाई नकाशात कोल्हापूर शोधत होत्या. (कारण मासिकातलं गोपाळ जोशींचं पत्र कोल्हापूरहून पाठवलेलं होतं). तेव्हा कार्पेंटरबाईच्या मनात भारतातील शहरं असा विचार होता. परंतु मुलीने येऊन हिंदुस्थान हा शब्द उच्चारला हे कसं? तिला तर काहीच ठाऊक नव्हतं. सर्वच आक्रित होतं. पुढे कार्पेटरबाईनी पत्रव्यवहार करून आनंदीबाईंशी स्नेहसंबंध जोडले. आनंदीबाई कार्पेंटरबाईना मावशी म्हणून संबोधत असत. कार्पेंटरबाईच्या आधारामुळे आनंदीबाईंना अमेरिकेत पाऊल टाकता आलं. कार्पेटरबाई आनंदीबाईना आनंदाचा झरा म्हणत. अमेरिकेत जाण्यापूर्वी श्रीरामपूरच्या (बंगाल) बॅप्टिस्ट महाविद्यालयाच्या सभागृहात आनंदीबाई जोशींनी मी अमेरिकेत का जाते या विषयावर सुमारे ५०० श्रोत्यांपुढे अगदी अस्सल मराठी ब्राह्मणी पेहरावात (नऊवारी पात्तळ) उभे ठाकून अस्खलित इंग्रजीत व्याख्यान दिलं. आनंदीबाईंचं हे भाषण खूप वाचण्यासारखं होतं. पृथ्वीच्या पाठीवर हिदुस्थानाइतका मागासलेला देश दुसरा नाही. देशातील लोकांना आपल्या गरजा पूर्ण करताना स्वावलंबन करता येत नाहीत. वैद्यकशास्त्र स्त्रियांची हिंदुस्थानच्या प्रत्येक भागात खूप जरुरी आहे. सभ्य स्त्रिया पुरुष वैद्याकडून चिकित्सा करून घेण्यास इच्छुक नसतात. असे महत्त्वाचे मुद्दे आनंदीबाईनी श्रोत्यांसमोर मांडले. त्यामुळे भारतात महिला डॉक्टरांची किती नितांत गरज आहे हे ओळखून आनंदीबाई डॉक्टरची पदवी घेण्यासाठी अमेरिकेत गेल्या. पण अमेरिकेत जाताना प्रत्येक ठिकाणी आनंदीबाईना सतत संघर्ष करावा लागला. १८८३ साली १८व्या वर्षी एका अमेरिकन बाईच्या सोबतीने आनंदीबाईंनी दोन महिने जहाजाने प्रवास करत एकाकी प्रवास केला. 

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘थॅंक यू डॉक्टर…’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘थॅंक यू डॉक्टर…’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव

(‘डॉक्टर्स डे’ चे औचित्य साधून)

डॉ. बी.सी. रॉय

नमस्कार मैत्रांनो!

“आधुनिक वैद्यकीय उपचारपद्धतीचा पाया रचणारे डॉ. विल्यम ऑस्लर यांचे प्रसिद्ध वाक्य आहे, ‘चांगला डॉक्टर रोगावर उपचार करतो; महान डॉक्टर हा रोग असलेल्या रुग्णावर उपचार करतो.”           

डॉ. बिधान चंद्र अर्थात डॉ. बी.सी. रॉय (१ जुलै, १८८२ – १ जुलै, १९६२) हे MRCP, FRCS या परदेशातील सर्वोत्तम पदव्यांनी अलंकृत असे निष्णात डॉक्टरच नाही तर आघाडीचे स्वातंत्र्यसेनानी होते. ते आधुनिक पश्चिम बंगालचे प्रणेते आणि दुसरे मुख्यमंत्री (१९४८-१९६१) होते. १९६१ साली त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला. १ जुलै १९६२ रोजी रॉय ह्यांचे त्यांच्याच जन्मदिवशी निधन झाले. १९९१ पासून भारतात १ जुलै हा त्यांचा जन्मदिन आणि स्मृतिदिन आपण ‘डॉक्टर्स डे’ म्हणून साजरा करतो.   

मी शपथ घेतो की….. डॉक्टर म्हणजे अजातशत्रू व्यक्तिमत्व. त्याला लढायचे असते ते रोग्याच्या आजाराशी. डॉक्टरांची ‘आचारसंहिता’ पूर्वापार चालत आलेली आहे. याबाबत एक उदाहरण आठवले. प्रत्यक्ष रावण पुत्र इंद्रजिताने लक्ष्मणावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग केल्याने लक्ष्मण बेशुद्ध पडला होता. या निकराच्या लढाईत देखील, बिभाषणाच्या सांगण्यावरून रामाने सुषेण या रावणाच्या राजवैद्याला पाचारण केले. राज्याच्या आचारसंहितेपेक्षा आपल्या वैद्यकीय व्यवसायाची ‘आचारसंहिता’ पाळीत सुषेणाने हनुमानाद्वारे आणल्या गेलेल्या संजीवनी औषधीचा योग्य उपयोग करीत लक्ष्मणाला मृत्यूच्या द्वारातून परत आणले. आश्चर्य असे की रावणाने यावर आक्षेप घेतला नाही. हिप्पोक्रेटस असो वा चरकाची शपथ, त्यातील सर्वात प्रमुख गोष्ट आहे, “एक डॉक्टर म्हणून माझे प्रथम कर्तव्य रुग्णसेवा हेच असेल. यापरीस कुठलीही बाब माझ्या दृष्टीने गौण आहे.” मंडळी, दुसऱ्या महायुद्धात चिनी सैनिकांसाठी चिकित्सक म्हणून गेलेल्या निस्वार्थ डॉक्टर कोटणीस यांचे चीन मध्येच वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी प्लेगच्या साथीत रुग्णसेवा करतांना त्याच आजाराने निधन झाले. आपले चीनशी कितीही राजनैतिक वैर असू दे, पण संपूर्ण चीन देशासाठी डॉक्टर कोटणीस हे आजही श्रद्धास्थान आहेत. 

मेडिकल शिक्षण आणि वैद्यकीय उपचार सेवा तेव्हां अन आता- ‘आमच्यावेळी असे नव्हते हो! तेव्हाचे डॉक्टर म्हणजे साक्षात देवच! आता तर नुसता बाजार झालाय!’ मंडळी, लक्षात असू द्या, बदल हाच जीवनाचा स्थायी भाव आहे. स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर सरकारी मेडिकल कॉलेजेस सुरु झालीत. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांप्रमाणे डॉक्टर पेशंटचे प्रमाण १:१००० असायला हवे. आपल्या देशाच्या वाढत्या लोकसंख्येला अनुसरून १९८०च्या दशकात खाजगी महाविद्यालयांना परवानगी देण्यात आली. मार्च २०२४ मधील (नॅशनल मेडिकल कौन्सिल) च्या आकडेवारीनुसार भारतात एकूण ७०६ वैद्यकीय महाविद्यालये आहेत. या ७०६ वैद्यकीय महाविद्यालयांपैकी ३८६ सरकारी आहेत तर ३२० खाजगी आहेत. डॉक्टर पेशंटचे प्रमाण आपल्या देशात १: ९००, म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांपेक्षाही चांगले आहे. 

मी दोनही क्षेत्रात कार्य केले आहे. इथे मला सर्वात मोठा फरक जाणवतो ते उपलब्ध निधीचा. सरकारी रुग्णालयातील पायाभूत सुविधा कमी, डॉक्टरांची संख्या कमी, (रिक्त जागा हे कायमचे दुखणे) मात्र एका बाबतीत सरकारी क्षेत्र दुथडी भरून वाहते, ते म्हणजे पेशंटची संख्या. गरीब रुग्ण अजूनही सरकारी दवाखान्याचा आधार घेतात. बहुतेक प्रायव्हेट दवाखान्यात पेशंटची आवक कमी! सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना भरपूर पेशंट बघायला मिळतात. यात अपवाद नक्कीच आहेत. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातही हुशार विद्यार्थी आहेत. शेवटी चिकाटी, मेहनत आणि जिज्ञासू वृत्ती ही महत्वाची. अतिशय वेदनादायी भाग म्हणजे भरमसाठ फी भरून ‘मॅनेजमेंट कोट्यात’ आपल्या पाल्याला खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात घालणारे पालक. जिथे सुरुवातच ‘मेडिकल सीट’ विकत घेण्यापासून होते, त्या विद्यार्थ्याच्या भविष्यकालीन ATTITUDE विषयी मी काय बोलावे?

आता उद्भवणाऱ्या नवनवीन समस्यांमुळे डॉक्टर आणि पेशंटमधील दरी रुंदावत चालली आहे. कट प्रॅक्टिस, अनावश्यक वैद्यकीय चाचण्या, डॉक्टरांच्या फीमधली तफावत, पंचतारांकित रुग्णालयाकडे डॉक्टर आणि पेशंट्सचा वाढता कल, डॉक्टरांनी गावात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचे टाळणे, एक ना दोन! बघा मंडळी, डॉक्टर समाजाचाच एक हिस्सा आहे. जिथे सामाजिक निष्ठा आणि नैतिकतेचे सर्व क्षेत्रात अवमूल्यन होते आहे, तिथे डॉक्टर त्याला अपवाद कसे असतील? समाज म्हणतो, “डॉक्टरांनी त्यांच्या पांढऱ्या कोटासारखी स्वतःची स्वच्छ प्रतिमा जपायला हवी!” मात्र कांही घटना अशा घडतात की दवाखान्यात आणण्याआधीच पेशंट सिरीयस होता, डॉक्टरांनी शक्य ते सर्व उपचार केले, पण हाताबाहेर गेलेला आजार पेशंटचा बळी  घेऊन गेला! अशा परिस्थितीत शोकमग्न नातेवाईकांचा क्रोध अनावर होऊन त्यांनी डॉक्टरला मारहाण करणे आणि त्याच्या क्लिनिकची तोडफोड करणे हे योग्य नव्हे.

एखाद्या दवाखान्याची गुणवत्ता तपासायची असेल तर त्यासाठी एक महत्वाचा निकष म्हणजे डॉक्टर मंडळी रोग्याची तपासणी सरासरी किती वेळ करतात. ‘तेव्हा’ आणि ‘आता’ यामध्ये बराच फरक पडला आहे. तेव्हांची फॅमिली डॉक्टरची संकल्पना अतिशय उत्कृष्ट होती. बहुतेक डॉक्टर्स पदवीधर असायचे (MBBS, RMP, LMP, Homeopath, Ayurvedic). मात्र त्यांच्या हाताला ‘गुण’ होता, मोजकीच बाटलीबंद औषधे, गोळ्यांच्या पुड्या आणि अगदी क्वचित इंजेक्शन यात त्यांचे उपचार बंदिस्त असायचे. रोग्याची संपूर्ण हिस्टरी, सखोल तपासणी, अनुभवाने आलेले वैद्यकीय ‘ज्ञान’, उपजत आणि कमावलेली सेवावृत्ती, यातून बहुदा अचूक निदान साधले जात होते. वैद्यकीय चाचण्या गरज असल्यास क्वचित व्हायच्या. परंतु याहून अधिक होता तो त्यांचा रोगी आणि त्याच्या नातेवाईकांशी सतत सुरु असलेला सुसंवाद, आश्वासक नजर आणि प्रेमळ वागणूक! त्यांच्या निदानाविषयी आणि दिलेल्या उपचारावर रोग्यांचा पूर्ण विश्वास असायचा. यातूनच बरे झाल्यावर अनुभवांती पेशंट डॉक्टरला खुशाल मनाच्या देव्हाऱ्यात बसवायचे. या विश्वासामुळे रोगी आज्ञाधारक बाळासारखे डॉक्टरची प्रत्येक सूचना अंमलात आणत असत. तंत्रज्ञान तितकेसे विकसित नसूनही ‘क्लिनिकल जजमेण्ट’ जबरदस्त असायचे. 

‘क्लिनिकल जजमेंट’ (चिकित्साविषयक निर्णयक्षमता)  

डॉ. विल्यम ऑस्लर म्हणतात, “वैद्यकीय उपचार ही दवाखान्यात प्रत्यक्ष काम करून शिकण्याची कला आहे, क्लासरूममधील धडे गिरवून ती साध्य होत नाही! आजकालचे वैद्यकीय शिक्षण पुस्तकी ज्ञानाच्या आहारी गेले आहे. प्रत्यक्ष व्यावहारिक वैद्यकीय ज्ञान मिळवण्याची प्रवृत्ती कमी झाली आहे. म्हणून भरगच्च आधुनिक वैद्यकीय चाचण्यांवर भर दिला जातोय. मात्र गेल्या ४-५ वर्षांपासून रोग्याशी ‘सुसंवाद’ साधण्याचे ‘शिक्षण’ मेडिकलच्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षांपासून देण्यात येत आहे. 

एक गोष्ट मला प्रकर्षाने मांडायची आहे की मार्कांसहित मेडिकल शाखेकडे जाण्याचा विद्यार्थ्यांचा खरोखरच मनापासून कल (aptitude and ability) आहे कां हे निरपेक्ष वस्तुनिष्ठ चाचण्या घेऊन ठरवले पाहिजे. हे कां तर एक विद्यार्थ्याला डॉक्टर बनवण्यासाठीचा ७० % खर्च समाज उचलत असतो. मग पदवी प्राप्त केलेल्या डॉक्टरांनी समाजाला १००% उत्तम वैद्यकीय सेवा देणे हे उपकार नव्हेतच, तर ते डॉक्टरांनी फेडायचे समाजऋण आहे, अगदी बँकेतून एजुकेशनल लोन काढून तो हफ्ते भरतो तसेच. कधी तर MBBS ची आवड नसूनही पालकांच्या दबावाखाली किंवा अन्य कारणांनी ती डिग्री घेतल्यावर कांही हुशार पण असमाधानी विद्यार्थी IAS किंवा UPSC च्या परीक्षांकडे वळतात. एक अभिमानाची बाब ही की पुण्यातील AFMC मधून पास झालेले डॉक्टर भारतीय लष्करात सेवादाखल होतात! अशा डॉक्टर प्लस लष्करी अधिकाऱ्यांना माझा कडक सॅल्यूट!!!

जागतिक आरोग्य संघटनेनुसार आरोग्य ही केवळ रोग किंवा अशक्तपणाचा अभाव नसून संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्याची स्थिती आहे. 

लेखाच्या अंती खालील मुद्दे नमूद करते.

*डॉक्टर माणूस आहे, देव नव्हे, त्याच्याजवळ जादूची कांडी नाही.  

*डॉक्टरांना त्यांचे वैयक्तिक आणि खाजगी आयुष्य असते, त्यांना कधीतरी त्यांच्या कुटुंबाला वेळ देणे आवश्यक असते. अशा वेळेस ते त्यांचा वैयक्तिक अधिकार म्हणून गंभीर आजार नसलेल्या रुग्णाचा उपचार करण्यास नकार देऊ शकतात. मात्र रोगी गंभीररित्या आजारी असेल तर माणुसकीच्या नात्याने ते दुसऱ्या डॉक्टरकडे रोग्याला पाठवायची व्यवस्था करू शकतात. 

*प्रत्येक रुग्ण आणि त्याचा रोग हे वेगवेगळ्या वेळी डॉक्टरांसमोर वेगवेगळी आव्हाने उपस्थित करीत असतात, त्यातून सर्वोत्तम मार्ग काढणे आणि प्रयत्नात कुठेही कसूर न ठेवणे ही त्यांची जबाबदारी आहे. *मोठ्या कॉर्पोरेट दवाखान्यात डॉक्टर हा तेथील साखळीचा एक दुवा असतो, त्यातील आर्थिक नियोजनात बहुतांश डॉक्टरांचा सहभाग नसतो. 

*डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व सूचना काटेकोरपणे पाळणे हे रोग्याचे परम कर्तव्य आहे. आजकाल हॉस्पिटल हॉपिंग (सेकंड, थर्ड किंवा त्याहून अधिक डॉक्टरांचे सल्ले घेणे), Mixopathy चा अवलंब करणे आणि आपले उपचार करणे, हे प्रकार वाढीस लागले आहेत. 

*डॉक्टरांनी रुग्णाला निरोगी जीवनशैलीचे महत्व समजावून सांगणे आवश्यक आहे. त्यात संतुलित आहार, व्यायाम, योग आणि ध्यान यांचा खूप मोठा सहभाग आहे. त्यासाठी त्यांनी स्वतः निरोगी जीवन शैलीचा अंगीकार करायला हवा! सिगारेट पीत पीत रोग्याला ‘तू सिगारेट पिणे बंद कर’ असे सांगणार का डॉक्टर?

वरील मुद्यांवर वाचकांनी आत्मचिंतन करून आपल्या सेवेशी तत्परतेने हजर असलेल्या डॉक्टरांच्या व्यवसायाचा आदर करीत त्यांच्यावर विश्वास ठेवावा, तसेच आपल्या आजाराची आणि आधी घेतलेल्या उपचाराची संपूर्ण माहिती त्यांच्यासोबत शेअर करावी असे मी आवाहन करते.  

ॐ सर्वे भवन्तु सुखिनः। सर्वे सन्तु निरामयाः।

सर्वे भद्राणि पश्यन्तु। मा कश्चित् दुःख भाग्भवेत्॥

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥        

(“सर्वजण सुखी होवोत, सर्वजण रोगमुक्त असोत, सर्वजण मंगलमय घटनांचे साक्षीदार राहोत आणि कोणालाही दुःखाचे भागीदार बनण्याची वेळ ना येवो!”)

डॉक्टर्स डे च्या सर्वांना निरामय शुभेच्छा!!!

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ माऊलींचा हरिपाठ… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

माऊलींचा हरिपाठ… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

सर्वप्रथम मी निवेदन करतो की हरिपाठावर या आधी अनेक संत आणि अधिकारी सत्पुरुषांनी चिंतन लिहिले आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेल्या पाठावर ‘काही’ लिहिणे हे खरंतर माझ्यासारख्या सामान्य बुद्धीच्या माणसाचे काम नाही, तरीही मी माझ्या सद्गुरूंच्या आधाराने यथामती लिहिण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करीत आहे.  

भगवंत प्राप्तीचा सर्वांगसुंदर मार्ग सर्व संतांनी स्वानुभूतीने सामान्य मनुष्यासाठी खुला करून दिला आहे. मनुष्य स्वाभाविकच स्वतःवर प्रेम करतो, त्यानंतर तो त्याच्या आवडीच्या माणसांवर, त्याच्या वस्तूंवर, घरादारावर, गाडी घोड्यावर, संपत्तीवर प्रेम करीत असतो. संत सांगतात त्याप्रमाणे हे प्रेम अंशतः का होईना स्वार्थी असतेच असते. या नश्वर जगात मनुष्य निःस्वार्थी प्रेम करू शकत नाही. जो मनुष्य निःस्वार्थी प्रेम करतो, तो सर्वांना आवडतो, त्यामुळे ती देवालाही प्रिय होतो. एका गीतात श्री. वसंत प्रभू म्हणतात

“जो आवडतो सर्वांना | तोचि आवडे देवाला|`” 

परमार्थ साधणे म्हणजे अधिकाधिक निःस्वार्थ होणे. परमार्थ मार्गात गुरू शिष्याला नाम देतात आणि मग शिष्य त्या नामाचा अभ्यास करून परमार्थ साधण्याचा यत्न करीत असतो. माऊलींचे गुरू निवृत्तीनाथ यांनी त्यांना हरिनाम दिले. त्या नामाचा अभ्यास करून ज्ञानदेवांनी ज्ञांनदेव ते ज्ञानेश्वर  इतकाच पल्ला गाठला नाही तर विश्वाची माऊली होऊन अवघाचि संसार सुखाचा करीन अशी ग्वाही दिली. माऊली म्हणतात,

“अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्हीं लोक ॥१॥ जाईन गे माय तया पंढरपुरा । भेटेन माहेरा आपुलिया ॥२॥ सर्व सुकृताचें फ़ळ मी लाहीन । क्षेम मीं देईन पांडुरंगी ॥३॥ बापरखुमादेवीवरु विठ्ठलेंसी भेटी । आपुले संवसाटी करुनि ठेला ॥४॥”

{अर्थ:- संसार हा दुःखरूप असून माऊली म्हणतात. तो संसार मी सुखाचा करीन याचा अर्थ संसार हा ज्या ब्रह्मस्वरूपा वर मिथ्या भासलेला आहे. ते ब्रह्म सुखरूप आहे. आणि मिथ्या पदार्थ अधिष्ठानरूप असतो. या दृष्टीने संपूर्ण संसार ब्रह्मरूपच आहे. असे मी ज्ञानसंपादन करून संसार सुखरूप करून टाकीन इतकेच काय त्रैलोक्य ब्रह्मस्वरूप आहे असे जाणून सर्व त्रैलोक्य आनंदमय करून सोडीन. हे जाणण्याकरीता त्या पंढरपूरास वारीला जाऊन माझे माहेर जो श्रीविठ्ठल त्याला मी आलिंगन देईल. त्या पंढरीरायाला आलिंगन देऊन आतापर्यंत केलेल्या माझ्या पुण्याईचे फळ मी प्राप्त करून घेईन. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांच्या भेटीला आतापर्यंत जे जे भक्त गेले. त्यांना त्यांनी आपलेसे करून सोडले. म्हणजे तो भक्त परमात्मरूपच होतो. असे माऊली सांगतात.

सामान्य मनुष्याला स्वतःचा प्रपंच नेटका करता येतोच असे नाही, कारण त्याच्या प्रपंचात स्वार्थ जास्त असतो. संत होणे म्हणजे अत्यंत निःस्वार्थ होणे. म्हणून सर्व संत विश्वाचा प्रपंच करतात आणि सद्गुरू कृपेने ज्ञानेश्वरांसारखे संत विश्वमाऊली होत असतात.

माउलींचा हरिपाठ हा सर्वमान्य आणि लोकप्रिय हरिपाठ आहे. आजही अनेक ठिकाणी त्याचे नित्य पठण केले जाते. सातशे वर्षांपूर्वी लिहिलेला हरिपाठ गावोगावी कसा पोहचला असेल आणि मागील सुमारे सातशे वर्षे तो नित्य म्हटला जात असेल तर जागतिक आश्चर्य नव्हे काय ? 

भगवन्नामाचे महात्म्य, महत्व आणि महती आपल्याकडील सर्व संतांनी मुक्त कंठानी गायिली आहे. ‘बिनमोल परंतु अमोल’ अशा नामांत मुक्ती, भुक्ती व भक्ती प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य आहे आई सर्वसंतांनी उच्चरवाने प्रतिपादित केले आहे. नामाने भवरोग नाहीसा होतो इतकेच नव्हे, तर सर्व शाररिक व मानसिक रोग नाहीसे करण्याची अगाध शक्ती भगवंताच्या नामांत आहे. प्रपंच व परमार्थातील नाना प्रकारच्या अडचणी, विघ्ने व संकटे नामाने सहज दूर होतात. अत्यंत नाजूक व साजूक असे भगवंतांचे प्रेमसुख मिळण्याचे भाग्य नामस्मरण करणाऱ्या नामधारकालाच प्राप्त होते. संसार ‘असार’ नसून तो परमेश्वराच्या ऐश्वर्याचा अविष्कार आहे अशी दृष्टी नामानेच प्राप्त होते. कर्म, वर्ण व धर्म यांचे बंड मोडून भगवतप्राप्तीचा मार्ग संतांनी केवळ नामाच्या बळावर सर्वाना खुला केला आहे. हरिपाठ म्हणजे विठूमाऊलीच्या गळ्यातील सत्ताविस नक्षत्रांचा हार आहे, असे म्हणता येईल. संत ज्ञानेश्वरांच्या संपूर्ण शिकवणुकीचे सारं म्हणजे हा हरिपाठ आहे असे म्हटले तर वावगे होऊ नये. एक कल्पना मांडतो. भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरीच्या सुमारे नऊ हजार ओव्या आणि हरिपाठाचे सत्तावीस अभंग. नऊ हजार ओव्यांचा अभ्यास सामान्य मनुष्याला तसा कठीणच जाणार यात वाद नसावा. पण तरीही ज्याला थोड्या वेळात आणि कमी श्रमात परमार्थ प्राप्ती करायची आहे त्याने या सत्तावीस अभगांचा अभ्यास केला तरी त्याचे काम होईल असे माऊली सांगतात. या हरिपाठ चिंतनाच्या निमित्ताने आपली सर्वांची नामावर असलेली निष्ठा आणिक वृद्धिंगत होवो ही सद्गुरू आणि माऊलींच्या चरणी प्रार्थना  करतो, सर्व सुजाण वाचकांना नमन करतो.

जय जय राम कृष्ण हरी।

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ताकास तूर न लागू देणे… लेखिका – सुश्री मुग्धा पानवलकर ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ ताकास तूर न लागू देणे लेखिका – सुश्री मुग्धा पानवलकर ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

‘ताकास तूर न लागू देणे.’ ही म्हण आपणास परिचित आहेच. 

या म्हणीचा प्रचलित अर्थ एखाद्या गोष्टीचा दुसऱ्याला अजिबात पत्ता लागू न देणे. 

पण इथे ताक हा  दही घुसळून केलेला पेयपदार्थ आणि तूर म्हणजे एक द्विदल कडधान्य अभिप्रेत नाही. तसा असता तर या म्हणीचा आणि त्याच्या अर्थाचा अर्थाअर्थी संबंध लागला नसता. तर याविषयी वेगळी माहिती आहे ती अशी…

इथे ‘ताक’ शब्द नसून ‘ताका’ शब्द आहे.   

ताका म्हणजे कापडाचा तागा. जुन्या शब्दकोशात हा अर्थ दिला आहे. 

आणि तूर हे द्विदल धान्य असा अर्थ इथे नाही. हातमागावर कापड विणण्यासाठी धागे गुंडाळून घ्यायचे जे विणकराच्या डोक्यावरचे आडवे लाकूड/तुळई असते तिला ‘तूर’ असे म्हणतात. हा ही शब्दकोशातील अर्थ आहे. 

म्हणजे या म्हणीचा शब्दशः अर्थ असा की, ताग्याचा आणि तुरीचा संबंधच येऊ न देणे.  थोडक्यात एखादी गोष्ट पार पडण्यासाठी जो कळीचा घटक आहे, तोच होऊ न देणे किंवा होणार नाही ह्याची काळजी घेणे.

तर अशी आहे ‘ताकाच्या तुरी’ची गंमत ! 

लेखिका : सुश्री मुग्धा पानवलकर

संग्रहिका : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares