मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ न वाचलं गेलेलं पत्र ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

न वाचलं गेलेलं पत्र ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

मेजर राजेश सिंग अधिकारी, महावीर चक्र (मरणोपरांत) 

भारत-पाकिस्तान कारगिल युद्ध. ३० मे,१९९९. 

दहाच महिन्यांपूर्वी त्याची अशीच वरात निघाली होती आणि तिच्या दारी आली होती. घोड्यावर बसलेला तो राजबिंडा…रूबाबदार! लष्करात अधिकारी असलेला तो होताच तसा देखणा. आठ वर्षांच्या सेवेत लष्कराने शिस्तीच्या संस्कारात एका कोवळ्या तरूणाचे मजबूत शरीरयष्टीच्या,अदम्य आत्मविश्वास असलेल्या, भेदक नजर असलेल्या एका जवानात रुपांतर केले होते… सैन्याधिकारी… राजेश सिंग धर्माधिकारी! इतक्या वर्षांत त्याने मेजर पदापर्यंत मजल मारली होती…आणि  आता तो बनला होता दीडशे ते दोनशे सैनिकांचे नेतृत्व करणारा लढवय्या. १९९९ वर्ष निम्मे सरत आलेले होते. कारगिल परिसरातून आता मेजर साहेबांची बदली होण्याचे दिवस जवळ आले होते. पण….कारगिलच्या शिखरांवरून अप्रिय बातम्यांचा वारा खाली घोंघावू लागला. 

सुरुवातीला वाटले होते की पाकिस्तानातून भारतात कश्मिरविरोधात भारतीय सैन्याला उपद्र्व देण्यासाठी घुसलेले अतिरेकी असावेत आणि तेही नेहमीप्रमाणे अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच. पण धर्माधिकारी साहेबांनी त्या पर्वतशिखरांवरून आपले हेलिकॉप्टर उडवत नेले आणि टेहळणी केली तर परिस्थिती गंभीर होती. घुसखोरांची संख्या अपेक्षेपेक्षा कित्येकपटींनी जास्त होती. शिवाय त्यांनी शिखरांच्या मोक्याच्या ठिकाणी पक्के आणि सुरक्षित बंकर्स खोदून ठेवलेत…त्यातून त्यांना खाली नेम धरणे सोपे होते. आणि अतिशय कडाक्याच्या थंडीपासून बचावासाठी त्यांनी अगदी जय्यत तयारी केलेली होती. गरम कपडे,बूट,हवाबंद पौष्टिक अन्नपदार्थ,संपर्क साधने आणि इतक्या उंचीवर आणून ठेवलेला पुरेसा दारूगोळा! 

मेजरसाहेब तळावर परतले ते चेह-यावर काळजीचा रंग घेऊनच. शत्रू आपल्या अत्यंत जवळ आला आहे. त्यांनी सहका-यांना सावध केलं. तोवर कारगिलच्या इतरही शिखरांबाबत हीच परिस्थिती असल्याचं स्पष्ट झालं होतं. कॅप्टन सौरभ कालिया साहेबांचं गस्तीपथक परतलेलं नव्हतं..त्यांना शोधायला गेलेल्या पथकावरही तुफान हल्ला होऊन पथक नेस्तनाबूत झालं होतं. मेजर धर्माधिकारी यांच्या समोर तोलोलिंग नावाचं भारताचं पर्वतशिखर आता शत्रूच्या ताब्यात होतं. आणि हे शिखर पुन्हा हस्तगत करायचं म्हणजे प्रत्यक्ष मरणाला सामोरं जाणं. कारण परिस्थिती शत्रूला शंभर टक्के अनुकूल होती…पण तोलोलिंग परत घेतलं तरच इतर शिखरं पादाक्रांत करता येणार होती. 

योग्य वेळ पाहून शिखरावर चढाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण पहिला प्रयत्न अर्धवट सोडून द्यावा लागला…कारण दाट धुकं,वरून शत्रूचा तुफान आणि अचूक गोळीबार. त्यात शत्रूच्या स्नायपरने आपल्या एका ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर यांना अचूक टिपून धारातीर्थी पाडलं होतं. त्यादिवशी अधिक चढाई करणं अशक्य झाल्यानं खट्टू होऊन माघारी फिरणं भाग पडलं. 

त्यादिवशी पलटणीत सैनिकांच्या कुटुंबियांची पत्रं पोहोचली. जशी चातकाला पावसाच्या पहिल्या थेंबांची प्रतिक्षा तशी जवानांना आपल्या आप्तांची ख्यालीखुशाली समजण्याची उत्कंठा. मेजर धर्माधिकारी तर नवविवाहीत. आणि राजेश आणि किरण…त्यांच्या संसाराच्या वेलीवर उमलू पाहणा-या एका फुलाच्या प्रतीक्षेत आणि स्वप्नात मग्न असलेलं दांपत्य! पण सीमेवर जमा झालेले युद्धाचे ढग आता किरण यांच्या घरापासूनही स्पष्ट दिसत होते. काळजाला लागलेल्या घोर काळजीचे प्रतिबिंब प्रत्येक शब्दात अगदी आरशासारखे स्वच्छ दिसत होते. पण…मेजरसाहेब तर आता मोहिमेवर निघालेले होते. त्यांना सोळा हजार फुट उंचीवर त्यांच्या पत्नीचे पत्र मिळाले! एका हातात पत्नीचे पत्र, एका हातात तोलोलिंगचा नकाशा आणि खांद्यावर रायफल. डोळ्यांनी पहावे तरी काय आणि वाचावे तरी काय? मेजरसाहेब सहका-यांना म्हणत होते… नकाशा वाचला पाहिजे…तेथून परतल्यावर निवांतपणे वाचता येईल की बायकोचं पत्र! असून असून असणार काय पत्रात? काळजी वाटते, काळजी घ्या…वाट पाहतो आहोत…आम्ही…म्हणजे मी आणि आपलं बाळ!  

तोलोलिंगवर चढाई करता येईलच पण जिवंत परतण्याची शक्यता शून्य! लष्करात जिंदगी घालवलेल्या सर्वांना हे दिसत होतं…आणि त्यात हा गडी म्हणतोय…मोहिमेवरून आल्यावर निवांत वाचेन की पत्र! इतर जवानांना मोहिमेवर निघताना आपल्या कुटुंबियांशी बोलता यावं म्हणून अधिका-यांनी खास सॅटेलाईट फोनची व्यवस्था केली होती. मेजर राजेश साहेबांनी आपल्या साथीदारांना आधी बोलू दिलं…साहेबांचा नंबर लागला आणि त्या सॅटेलाईट फोनची बॅटरी संपली…बोलणं झालंच नाही…शेवटपर्यंत. 

मागच्याच आठवड्यात मेजरसाहेबांनी आपल्या अर्धागिंणीला पत्र धाडलं होतं. “मला लढाईला पाठवलं जातंय…आणि मलाही जायचंच आहे खरं तर. सैनिकासाठी लढाई म्हणजे एक तीर्थयात्रा…दोन्ही लोकी आशीर्वाद देणारी. मी परत येण्याची शक्यता धूसर आहे. नाहीच आलो तर आपल्या होणा-या बाळाला कारगिलच्या या शिखरांवर नक्कीच घेऊन ये. दाखव त्याला..त्याचा बाप कुठे लढला ते! देशाचा संसार सावरला तरच मी आपला संसार भोगू शकेन. या पत्राच्या उत्तरात तू काय लिहिणार आहेस हे मला आधीच ठाऊक आहे….!” 

याच पत्राचं उत्तर आलं असावं…आणि त्यात बाईसाहेबांनी काय लिहिलं असावं याची उत्सुकता मेजरसाहेबांना असण स्वाभाविक होतं. पण कर्तव्यापुढे वैय्यक्तिक आयुष्य कवडीमोलाचं असतं सैनिकांसाठी! संसार तर होत राहील….देशाचा संसार राखणं गरजेचं होतं. मेजरसाहेबांनी ते पत्र न उघडताच आपल्या ह्र्दयावरील खिशात अलगद ठेवून दिलं आणि प्लाटून…लेट्स मार्च अहेड! असं खड्या आवाजात म्हणत ते आपल्या सहकारी सैनिकांच्या चार पावलं पुढेच निघाले….नेत्याने अग्रभागी राहायचं असतं…शत्रूला भिडायचं असतं. नव्वद अंशाचा,चढण्यास अशक्य असलेला कोन,पहाटेचा अंधार,जीवघेणी थंडी,वरून होणारा गोळीबार. खरं तर शत्रू इतका आरामशीर बसला होता की त्यांना गोळ्याही झाडण्याची गरज पडली नसती…केवळ एखादा दगड जरी वरून भिरकावला असता खाली तरी वरती चढण्याच्या प्रयत्नात असलेला भारतीय जवान खोल दरीत कोसळून गतप्राण होईल…आणि तसं होतही होतं. 

मेजरसाहेबांना आता थांबायचं नव्हतं. त्यांनी आपल्या तुकड्यांना तोलोलिंगला तिन्ही बाजूने वेढण्याचे आदेश दिले. आणि मधल्या तुकडीच्या अगदी पुढे निघाले सुद्धा…त्यांच्या दिशेने अर्थातच तुफान गोळीबार सुरु झाला….दुश्मनांकडे अत्याधुनिक शस्त्रं होती आग ओकणारी. मेजरसाहेब तशाही स्थितीत मोठमोठे दगद शिताफीने ओलांडत आणि त्याचवेळी आपल्या गनमधून वर फैरी झाडत इंचाइंच करीत वर जात होते. शत्रू लपून बसलेल्या पहिल्या बंकरपर्यंत पोहोचताच त्यांची आणि शत्रूच्या दोन जवानांची समोरासमोर गाठ पडली…मेजरसाहेबांनी त्या दोघांशी हातघाईची लढाई लढली. शत्रू काही अर्धप्रशिक्षित घुसखोर अतिरेकी नव्हता…पाकिस्तानी लष्कराचा नियमित सैनिक होता. पण भारतीय लष्कराचे प्रशिक्षण वरचढ ठरले….आणि भारतीय जवानांचे मनोधैर्यही! मेजरसाहेबांनी दोघांचाही खात्मा केला…हे सगळं करत असताना त्यांच्या देहात गोळ्या घुसलेल्या होत्या. हे सगळं त्यांचा एक सहकारी काही अंतरावरून पहात होता…तेव्हढ्यात त्याच्या संपर्क साधनावर वरीष्ठ अधिका-याने संपर्क साधला….सहकारी म्हणाला…अधिकारी साहब…जांबाजीसे लड रहे है….” तितक्यात एका गोळीने या सहका-याचा वेध घेतला…संपर्क कायमचा समाप्त झाला. 

इकडे मेजरसाहेबांनी पुढे कूच केले…पहिला बंकर जवळ जवळ ताब्यात आलेला असतानाच त्यांच्यावर अगदी जवळून गोळीबार झाला….आणि देहाचा आणि जीवाचा संबंध संपुष्टात आला! आता आत्मा मुक्त झाला होता स्वर्गात जाण्यास! मेजरसाहेबांचे सोबतीही या प्रवासात त्यांच्याच सोबत होते! यश थोडे मिळालेले असले तरी त्या यशाने पुढच्या यशाचा पाया रचला होता….ही अशक्यप्राय कामगिरी होती….हे खरं तर आपलंच अपयश होतं….शत्रूच्या कावेबाजपणाचा अंदाज यायला तसा खूप उशीर झाला होता आणि हा डाग धुण्यासाठी रक्तच कामी येणार होतं…आणि सुदैवानं या रक्ताची टंचाई नाही आपल्याकडे. 

छातीत घुसलेल्या गोळ्या… त्यातून रक्ताचे प्रवाह शरीरभर ओघळत असताना त्या रक्ताने मेजरसाहेबांच्या खिशातील पत्रालाही अभिषेक घातला….सौ.किरण अधिकारी यांनी जीवाच्या तळापासून लिहिलेले शब्दांनी लालरंग ल्यायला होता….विरहाची पत्रं प्रेमिकांच्या आसवांनी भिजतात …इथं शेवटचा निरोप रुधिराने ओलाचिंब झालेला होता. 

बारा तेरा दिवस मेजरसाहेब आणि सहका-यांचे निष्प्राण देह तोलोलिंगवर शत्रूच्या बंकर्समध्ये निश्चेष्ट पडून होते……युद्धाच्या धुमश्चक्रीत तिथपर्यंत पोहोचणं अशक्य होतं…आणि ते देह परत मिळवण्याचा वज्रनिर्धार करून पुन्हा तोलोलिंगवर चढाई करण्यास आणखी जवान आणि अधिकारी सज्ज होते! लीव न में बहाईंड. कोई साथी पिछे न छुटे! 

मेजरसाहेबांच्या घरी चौदा दिवस काहीही खबर नव्हती….कलेवरंच नव्हती तर हौतात्म्य जाहीर तरी कसं करायचं? कोण जाणो…चमत्कार झालेलाही असावा! पण असे चमत्कार विरळा! 

आज मेजरसाहेब आपल्या स्वत:च्या घरी आले होते…जसे नव्या नवरीला घरी मिरवणुकीने घेऊन आले होते तसे…पण आज दृश्य वेगळे होते. फुलं होती,हार होते…पण ते सरणावर जाणा-या देहावर पांघरण्यासाठी. हजारो लोक होते सोबत…पण त्यांच्या ओठांवर अमर रहेच्या घोषणा आणि डोळ्यांत आसवं. 

ती अगदी स्तब्ध उभी होती त्याच्या. इतरांच्या शोकाच्या गदरोळात तिचं शांत राहणं भयावह होतं. लोकांना आता तिचीच काळजी वाटू लागली…दु:खानं भरलेलं काळीज मोकळं नाही झालं तर काळीज फाटून जातं…अल्फ्रेड लॉर्ड टेनिसनने लिहून ठेवलंय… Home they brought her warrior dead: She nor swoon’d nor utter’d cry:All her maidens, watching, said, “She must weep or she will die.” त्यांनी त्या हुतात्मा योद्ध्याचा,तिच्या पतीचा मृतदेह तिच्या घराच्या अंगणात आणून ठेवला आहे…पण ती थिजून गेलीये…एकही हुंदका फुटत नाहीये….ती रडली नाही तर ती सुद्धा मरून जाईल…(मग तिच्या नवजात बाळाचं काय होईल?) पण इथं कुणी काहीही बोलायची हिंमत करत नव्हतं! ती बराच वेळ तशीच उभी राहिली त्याच्या कलेवराजवळ…आणि तेवढ्यात पार्थिव घेऊन आलेल्या लष्करी अधिका-याने तिच्या हातात मोठ्या अदबीने एक लिफाफा ठेवला…त्या लिफाफ्यावर ठळक अक्षरात नाव होतं…तिच्याच अक्षरात….मेजर राजेश अधिकारी यांस….! लिफाफा फोडला गेलेला नव्हता..आतलं पत्र तसंच होतं…वाचलं न गेलेलं!  

तो आता ते पत्र कधीही त्याच्या डोळ्यांनी वाचू शकणार नव्हता…मात्र त्याचा आत्मा कदाचित पत्रातील मजकूर ऐकायला आतुर झालेला असेल…तिने आसवांच्या शब्दांनी त्याच्या कानात तिने पत्रात लिहिलेला मजकूर ऐकवला असेल…तिने लिहिले होतं….तुम्ही परत आलात तर मी खूप भाग्यवान समजेन स्वत:ला, पण मातृभूमीच्या रक्षणार्थ तुम्ही प्राणांचं बलिदान दिलंत तर एका योद्ध्याची पत्नी म्हणून मी अभिमानाने जगेन. आपलं होणारं बाळ मुलगा असेल की मुलगी मला माहित नाही…पण मी त्या बाळाला तुम्ही लढलात त्या युद्धभूमीवर निश्चित घेऊन येईन…आणि त्याला किंवा तिला तुमच्यासारखंच शूर योद्धा बनवीन….तुम्ही माझे हे उत्तर तुमच्या डोळ्यांनी वाचलं असतं तर तुम्हांला किती आनंद झाला असता ना…राजेश?  तुम्हांला इन दी हेवन हे गाणं म्हणायला आवडायचं ना!  

Beyond the door There’s peace, I’m sure And I know there’ll be no more Tears in heaven…स्वर्गात आसवांना जागा नाही मुळीच….सुखद शांतता असते तिथे….मला माहित आहे…तुम्ही त्या स्वर्गात सुखनैव रहाल! 

(पंचवीस वर्षांपूर्वी कारगिल युद्धाच्या अगदी आरंभीच्या दिवसांत तोलोलिंग नावाचं महत्त्वाचं शिखर पाकिस्तान्यांकडून ताब्यात घेण्यासाठी तेथील पत्थरांना आपल्या जवानांनी अक्षरश: रक्ताचा अभिषेक घातला. यातीलच एक तरूण रक्त होतं मेजर राजेशसिंह अधिकारी यांचं. मुंबईच्या सैनिकप्रेमी भगिनी उमा कुलकर्णी या रोज एका सैनिकाची माहिती पोस्ट करीत असतात. त्यातूनच अधिकारी साहेबांच्या पराक्रमाविषयी वाचायला मिळालं. आणि महावीर चक्र (मरणोत्तर) विजेते मेजर राजेशजी अधिकारीसाहेब आणि त्यांच्या पत्नीचा,कुटुंबियांचा त्याग प्रखरतेने नजरेसमोर आला. त्या पोस्टवर आधारीत हा लेख आहे.) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दयाघना आणि रसूल अल्लाह ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ दयाघना आणि रसूल अल्लाह ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

तिच्या देहाची कितीतरी वर्षांपूर्वीच माती झालीये…पण तिचा आत्मा अजूनही अधांतरीच आहे, अडकून पडलाय काळकोठडीत..बंदिवासात ! ती एकटीच आहे इथे…या प्रशस्त राजप्रासादात. अगदी रया गेली आहे या वास्तूची. पडक्या भिंती…दिवाणखान्यातील रंग उडालेली तैलचित्रं आणि भंग झालेली शिल्पं. क्रूर श्वापदांचे अक्राळ विक्राळ मुखवटेही आता केविलवाणे भासताहेत. तिला या बंदिवासात ढकलणारा सुद्धा आता या जगात नाही, आणि तिला सोडवण्याचा प्रयत्न करणाराही कुठं दिसत नाही. आत्म्याला देहाच्या मर्यादा नाहीत आता…पण तरी तिला त्या बेसुमार मरुभूमीच्या पल्याड जाण्याचा मार्ग गवसत नाहीये…ती आजही अशीच मध्यरात्र उलटून गेल्यावर आपल्या कोठडीतून तिच्या उस्तादाच्या कोठडीपर्यंत धावत आलेली आहे….उस्ताद तिचा संगीत शिक्षक…ती आणि तिची थोरली बहिण गाणं-नाचणं शिकायच्या या उस्तादाकडे. राजवाड्यातल्या हुकुमची कामुक नजर पडली होती तिच्या थोरल्या बहिणीवर. पण उस्तादाने डाव ओळखून या दोघींना,त्यांच्या बापाला  सावध केलं…आणि तिथून दूर निघून जा असं बजावलं. पण त्या राजवाड्याच्या भिंतींना भले मोठे कान होते…राजाचे कानही तिखट होते. त्याने पळून जाऊ पाहणा-या बापलेकीला चाबकाने फोडून अर्धमेलं केलं…फेकून दिलं वाळवंटातल्या तापल्या मातीत तडफडून मरण्यासाठी. ही धाकटी..अजून वयात यायची होती आणि फार फार तर चार-पाच वर्षात बाई होणारच होती ! राजाने तिला कैदेतच ठेवलं आणि उस्तादाला सुद्धा. 

मध्ये कित्येक वर्षे उडून गेलीत..एका ठिकाणची वाळू दूर उडून जाऊन तिने भलतीकडेच आपलं बस्तान बसवलं आहे. उस्तादही नाहीत…पण आज तिला ते दिसताहेत…त्यांच्या कोठडीत मंद दिवा मिणमिणतो आहे…त्यांनी राग ‘पूर्वी’ छेडला आहे….स्वर अगतिक आहेत…विदग्ध आहेत ! धर्मानं अल्लाहचा बंदा आहे उस्ताद…त्याच्या रसूल अल्लाहला विनवणी करतो आहे….कर दो कर दो… दूर पीर हमारी ! हे ईश्वरा…हे दु:ख,पीडा दूर कर आमच्या जीवनातली…! 

इथं पंडित ह्रदयनाथ मंगेशकरांचा आर्त स्वर वाळवंटाच्या खोल उरातून उगवतो आहे….त्यांनी केंव्हातरी दीनानाथांच्या मुखातून ऐकलेली एक बंदिश….राग पूर्वी मधली…यावरच पुरिया धनाश्री आधारलेला आहे असे अभ्यासक म्हणतात. दीनानाथांच्याच ‘बाळ’मुखातून ही बंदिश आता  स्रवते आहे. स्वरांच्या लेखी ईश्वर-अल्लाह एकच…स्वर पाण्यासारखे प्रवाही आणि रंगहीन असतात ! संगीत-साधकाला स्वर प्यारे..शब्द केवळ स्वरांची पालखी वाहणारे दास !  

क्षुधित पाषाण (Hungry Stone) या रवीन्द्रनाथ टागोरांच्या कादंबरीवर आधारीत गुलजार यांनी लिहिलेली चित्रकथा म्हणजे हिंदी चित्रपट ‘लेकीन’! डिम्पल कपाडिया..विनोद खन्ना. वर्ष १९९०. लतादीदी निर्मात्या आणि हृदयनाथ मंगेशकर संगीत दिग्दर्शक. ‘यारा सीली सीली (ओलसर) बिऱहा की रात का जलना’…सारखी अनेक मधुर गाणी दिली बाळासाहेबांनी..स्वर अर्थातच थोरल्या बहिणीचा..दीदीचा !  ‘लेकीन’ मधलं ‘सुरमयी शाम जिस तरहा आये..सांस लेते हैं जिस तरहा साये’…आणि मुलायम आवाजाची देणगी लाभलेले सुरेश वाडकर…आठवताहेत का? 

या आधी १९८० मध्ये यशवंत दत्त अभिनित ‘संसार’ नावाचा मराठी चित्रपट आला होता. गीतकार होते सुधीर मोघे नावाचे अमोघ शब्द रचना करणारे कवी. बाळासाहेबांनी त्यांच्या ‘दयाघना..का तुटले चिमणे घरटे…उरलो बंदी असा मी !’ या काव्याला सुंदर चालीत चालवताना ‘पूर्वी’चेच सूर दिलेत..! आणि चित्रीकरणात यशवंत दत्त यांनी गाणे जगून दाखवलं आहे.    

….. हे दयाघना, माझं इवलंसं घरटं मोडून पडलंय आणि उरलो आहे फक्त मी..एकाकी! माणसाचा जन्मच जणू एक कारागृह. इथं मागील जन्मातील कर्मांची फळं रोख भोगायला जन्माला यायचं आणि या जन्मातही कर्मांच्या गाठोड्यात आणखी भर घालत बसायचं..’ पुनरपि जननं…पुनरपि मरणं..पुनरपि जननी जठरे शयनं !’ हा बंदिवास मला चुकणारच नाही…मी तुझा बंदिवान ! या कोठडीला दहा दिशांच्या  मजबूत भिंती आहेत आणि कैद्यांच्या हातात मोहाच्या,मायेच्या अवजड बेड्या….स्वत:हून काढल्या तरच निघणा-या ! पण या बेड्या काढण्याची,फेकून देण्याची इच्छाच होत नाही इथल्या बंदिवानाला..सवयीचं झालेलं असतं…यालाच माया म्हणतात…’मा’…णसाला ‘या’…तना देणारी !  ही माया माझे प्राण व्याकूळ करते आहे…देवा ! जन्माच्या चुलांगणावर बालपणीचं दुधाचं भांडं ठेवलं आहे…आणि त्याकडे खेळण्याच्या नादात ध्यानच नाही गेलं..बालपण उतू गेलं…अग्निच्या मुखात गेलं ! उरलेल्या दुधात वासनांचा मिठाचा खडा पडला नकळत…नासायाला वेळ नाही लागला !… आता देह वार्धक्याच्या वळचणीला येऊन उभा राहिला आहे…श्वास बालपण आठवू देत नाहीत, आणि तारुण्याच्या माजघरात पाय ठेवू देत नाहीत…अंगणात ऊन आहे…याच अंगणात हा देह एके दिवशी आडवा निजलेला दिसणार आहे…शेवटच्या प्रवासाला जाण्यासाठी…दयाघना ! का तुटलं माझं घरटं? हा प्रश्न नाहीये…हा स्वत:शी केलेला वैराण संवाद आहे..बंदिवानाला उत्तर मागण्याचा अधिकार नसतो !      

दयाघना, का तुटले चिमणे घरटे ?

उरलो बंदी असा मी !

अरे, जन्म बंदिवास सजा इथे प्रत्येकास

चुके ना कुणास आता बंदी तुझा मी दयाघना !

 

दहा दिशांची कोठडी मोह-माया झाली वेडी

प्राण माझे ओढी झालो बंदी असा मी दयाघना !

 

बालपण उतू गेले अन्‌ तारुण्य नासले

वार्धक्य साचले उरलो बंदी पुन्हा मी दयाघना !

(आंतरजालावर हृदयनाथ आणि लता दीदी एका जाहीर कार्यक्रमात वर उल्लेख केलेली रसूल अल्लाह ही बंदिश सादर करतानाचा विडीओ आहे. दीदीनी एक स्वर लावलाय…उंच…आणि तो स्वर अपेक्षित ठिकाणी पोहोचल्यावर त्यांच्या चेह-यावरचं हास्य पाहण्यासारखं आहे…बाळासाहेबही आता तीच उंची गाठताहेत..श्रोते क्षणभर स्तब्ध आणि मग टाळ्यांचा गजर…अखंड ! जा जा रे जा पथिकवा….आणि त्यावरून दयाघनाची याद आली ! म्हणून हे लिहिलं…)

(तपशीलात चुका आणि दीर्घ लेखनाचा दोष आहेच…दिलगीर आहे!)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिलक  !” भाग – २ —लेखक : श्री पार्थ बावसकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

(२३ जुलै १८५६ – १ अगस्त १९२०)

☆ “इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिलक  !” भाग –२ —लेखक : श्री पार्थ बावसकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

(“आई, या पावसाला आणि गर्दीला घाबरू नकोस! अगं, टिळकांकरिता खुद्द देवसुद्धा रडत आहेत. मा ! लुक हिअर, इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिलक!”) – इथून पुढे 

धुवाँधार बरसणाऱ्या पावसामुळे लोक ओलेचिंब झाले होते. रस्त्यावर चिखल झाला होता. माणसांची पांढरी धोतरे चिखलाने माखून काळीठिक्कर पडली होती. मुंबईच्या पारशी व्यापाऱ्यांनी विशेष व्यवस्था म्हणून चंदनाची चिता तयार केली होती. त्यावर टिळकांचे कलेवर ठेवण्यात आले, तोच त्या समुद्रकिनाऱ्यावरील लोकसागराला अचानक भरती आली. साखळ्या तोडून लोक टिळकांच्या चितेकडे धावत सुटले.

लोकमान्यांना अग्निडाग दिला आणि एका मुसलमान तरुणाचा धीरच सुटला. लोकमान्य गेले, आता आपण तरी जगून काय करायचे, असे म्हणून त्याने हंबरडा फोडला आणि त्याने चितेमध्ये उडीच घेतली. तो होरपळला गडगडत बाहेर फेकला गेला. त्याला दवाखान्यात नेले, पण काही दिवसांनी तोही लोकमान्यांच्याच वाटेवर निघून गेला.

संध्याकाळचे ७ वाजले तरीही त्याची शुद्ध कुणाला नव्हती. टिळकांच्या महानिर्वाणाचे हे दृश्य ‘याचि डोळा’

अनुभवणारे नाना कुलकर्णी लिहितात, “आम्ही त्या रात्री १० वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत पायावर उभेच होतो. अखेर शेवटचा घाला झाला. मन सुन्न झाले. हृदयात काय होत होते, हे सांगताही येईना. पावसाच्या धारा कोणत्या आणि अश्रूच्या धारा कोणत्या, हे समजेना, अग्निसंस्कार झाला, पण चौपाटीवरून पायच निघेना.”

जगभरातल्या अनेक वर्तमानपत्रांनी टिळकांना आदरांजली अर्पण केली. मृत्युलेख लिहिले, पण अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी लिहिलेला अग्रलेख त्यातला सर्वोत्तम. खरे तर टिळक जाण्यापूर्वी त्यांचे आणि टिळकांचे भांडण होते, तरीही टिळकांबद्दल असलेले अपार प्रेम संदेशकारांना अस्वस्थ करत होते. त्यांच्या लेखणीला शब्दांचा महापूर आला होता. या महापुरात ते फक्त टिळकांना शोधत होते आणि म्हणत होते,

” लोकमान्य, तुम्हाला आता कुठे पाहू? तुमची सावळी मूर्ती कुठे अवलोकन करू? तुम्हाला कुठे शोधू? तुम्हाला कुठे धुंडाळू? आमचा जीव तुमच्या जीवाशी गोठलेला होता. आमचा प्राण तुमच्या पंचप्राणांचा भाग होता. आमचे अस्तित्व तुमच्या अस्तित्वात गुरफटून गेले होते. आमचे जीवन तुमच्या जीवनात गुंतलेले होते. लोकमान्य! आता तुम्ही आम्हाला कुठे सापडाल? कुठे दिसाल? तुम्ही जात असताना आमच्या जीवनाला ओढणी लागलेली आहे. आमच्या प्राणांना क्लेष पडत आहेत. काट्याच्या जाळ्यावरून ज्याप्रमाणे रेशमी वस्त्राला फराफरा ओढावे, त्याप्रमाणे आमच्या हृदयाच्या चिरफाळ्या झालेल्या आहेत. लोकमान्य, आमचे प्राण तुमच्या स्वाधीन ! आमचे मन तुमच्या स्वाधीन ! आमचे जीवन तुमच्या स्वाधीन ! “

“ लोकमान्य, आम्ही, तुमचे तुम्ही आमचे आहात ! बोला, काय वाटेल ते सांगा, वाटेल ती आज्ञा करा, वाटेल तो हुकूम फर्मावा, आणि बोला, तुम्हाला कुठे शोधू? लोकमान्य, आम्ही तुम्हाला कुठे शोधू? आमचा वीर, हा आमचा हिरो, हा आमचा प्राण, हा आमचा लोकमान्य ! इतका सर्वव्यापी होता की, त्याने या महाराष्ट्रातील चर आणि अचर, सजीव आणि अजीव, सचेतन आणि अचेतन, इतकेच काय पण या महाराष्ट्रातील मानव, देव, किन्नर, विभूती या महाराष्ट्रातील साधू, संत, योगी, तपस्वी या महाराष्ट्रातील जल, स्थल, पाषाण, तरु, लता, उद्यान, पुरेपूर व्यापून टाकले होते. आमच्या लोकमान्या, लोकांच्या लोकमान्या, महाराष्ट्राच्या लोकमान्या, तुझ्याशिवाय जीवाला ओढणी का रे लागते। लोकमान्या, तुझ्याशिवाय जीव तुटतो रे।”

“ ४० वर्षांपर्यंत इथल्या जनतेला वेड लावणाऱ्या जादुगारा, लोकमान्या, यावेळी आम्हाला सोडून चाललास? जनतेच्या जनतानंदा या शोकसागरात आम्हाला लोटलेस? लोकांच्या प्रेमातील लोकमान्या, अश्रूच्या दर्यात आम्हाला टाकून दिलेस? देशबांधवांच्या कैवल्या, आम्हा सर्वांना विलाप करायला ठेवलेस? भारत देशाच्या कुलदीपक तिलका. आम्हास असाहय्य दीन, अनाथ केलेस? बोला, लोकमान्य बोला! राग टाकून बोला, पूर्वप्रेमाच्या सर्व स्मृतींनी बोला की, तुमच्या विरहावस्थेत या तुमच्या महाराष्ट्राने काळ कंठावा तरी कसा?…

कारण लोकमान्या, तू गेलास आज तुझ्याबरोबर महाराष्ट्राचा शिवाजी गेला आहे! तू गेलास, तुझ्याबरोबर महाराष्ट्राचा अर्जुन गेला आहे! लोकमान्य बाळ गंगाधर, तुम्ही गेलात ते तुमच्याबरोबर महाराष्ट्राची ज्ञानेश्वरी, महाराष्ट्राचे महाभारत, महाराष्ट्राचे रामायण, लुप्त होऊन गेलेले आहे! आम्ही हजारो प्राणी तुमच्या जागी नेण्यास योग्य होतो. पण, तुमचीच निवड करताना परमेश्वराने महाराष्ट्राचे कोणते हित पाहिले? “

त्या रात्री गर्दी ओसरल्यावर अनेकजण पुन्हा टिळकांच्या चितेजवळ गेले. त्यापैकी अनेकांनी टिळकांची ती राख एका पुडीत घेतली. ती पुडी हृदयाशी लावली. काहींनी चांदीच्या, सोन्याच्या डबीत तिला जन्मभर जपून ठेवले. टिळकांवर अंत्यसंस्कार जरी मुंबईत झाले, तरीसुद्धा पुढचे क्रियाकर्माचे संस्कार मात्र पुण्यातच पार पडले. १२ जुलै रोजी टिळक पुण्याहून मुंबईला निघाले होते, ते स्वतःच्या पायावर चालत. पण, आता ३ ऑगस्ट रोजी त्यांच्या अस्थी पुण्यात आणल्या जात होत्या स्पेशल ट्रेनने, फुलांच्या माळांनी सजवलेल्या चंदनाच्या पेटीत, एका चारचाकी रथात टिळकांच्या अस्थी पुण्यात आणल्या गेल्या.

केळकर लिहितात,

” जाताना ते आपल्या साडेतीन हात देहाने बाहेर पडले, पण येताना ते अंगुष्ठमात्र देहाने आले. जाताना त्यांनी अंगात नेहमीचा पोशाख घातला होता, येताना त्यांनी चिताभस्माचे रूप धारण केले होते. जाताना ते आपल्या पायांनी गेले, येताना ते एका वितभर चांदीच्या पेटीत निजून आपल्या परिचारकांच्या खांद्यावर बसून आले. जाताना त्यांचा सर्व ऐहिक व्याप त्यांच्या डोक्यात घोळत होता, येताना त्या सर्व व्यापांचा त्यांनी त्याग केलेला होता. जाताना ते वासनापूर्ण होते, येताना त्यांनी सर्व वासना टाकून दिल्या होत्या. जाताना ते लोकांविषयी बोलत होते, येताना त्यांनी स्वतः शाश्वत मौनव्रत स्वीकारले असून सर्व लोक मात्र त्यांच्याविषयी बोलत होते. जाता जाता त्यांनी टिळकपूर्ण असे पुणे सोडले, येताना त्यांनी टिळकशून्य अशा पुण्यात प्रवेश केला.”

ज्या दिवशी लोकमान्यांना तिलांजली देण्याचा विधी झाला, त्या दिवशी लोकमान्यांच्या पिंडाला कावळा लवकर स्पर्श करेना. पण, यात वेगळे काहीच नाही, असे म्हणत यावर अच्युत बळवंत लिहितात,

” टिळकांच्या पिंडाला स्पर्श कसा होणार? लोकमान्यांनी केलेल्या एवढ्या मोठ्या संकल्पात कोणकोणत्या इच्छा भरलेल्या होत्या? कोणकोणते बेत गूढ स्वरूपात होते? कोणकोणत्या योजना परत राहिलेल्या होत्या व कोणकोणत्या महत्त्वाकांक्षा अपुऱ्या राहिलेल्या होत्या, त्याचा शोध आता कसा लागणार? असा कोणता पराक्रमी पुरुष आहे की ज्याच्या सगळ्या इच्छा परिपूर्ण झालेल्या असतील? श्री शिवाजी महाराजांच्या सर्व इच्छा परिपूर्ण झालेल्या असतील काय? नर्मदातीरी वारलेल्या बाजीरावांच्या इच्छा परिपूर्ण झाल्या असतील का? सिकंदर किंवा पिटर दि ग्रेट इच्छा परिपूर्ण होऊन मेला असेल काय? आहो, पराक्रमी पुरुषांचे लक्षणच हे आहे की, त्यांच्या इच्छा कधीही पूर्ण झालेल्या नसतात. पराक्रमी लोकांच्या इच्छा भरधाव दौडीने धावत असल्याकारणाने त्या इच्छा परिपूर्ण करणे, हे एका आयुष्याला अशक्यच आहे! एका आयुष्यात इच्छा परिपूर्ण होतील तो कदाचित शहाणा असेल, पण पराक्रमी कधीही असणार नाही. आपल्या राष्ट्राचे अपरिमित वैभव इच्छिणारे जे लोकमान्यांसारखे पराक्रमी पुरुष असतात, त्यांच्या इच्छा अपरिमित असणे हेच त्यांना भूषण! आणि इच्छा अपरिमित असल्या की त्याची तृप्ती कुठून होणार? लोकमान्यांच्या पिंडाला काकस्पर्श लवकर झाला नाही, तो याच कारणामुळे होय.”

” टिळकांवर लोकांचे खरे प्रेम असेल तर ‘लोकमान्य’ ही पदवी त्यांनी अनंत काळापर्यंत अनन्यसामान्यच ठेवली पाहिजे. ‘लोकमान्य’ या शब्दाने यापुढील हिंदुस्तानच्या इतिहासात कोणाही कितीही मोठ्या व्यक्तीचा उल्लेख होता कामा नये.” 

केळकरांनी ही अपेक्षा व्यक्त करून १०० वर्ष झाले. टिळक जाऊन १०० वर्ष झाले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी केलेली ती सिंहगर्जना त्यांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने पुन्हा एकवार आठवावी, आळवावी या हेतूने केलेले हे टिळकांच्या सिंहगर्जनेचे सिंहावलोकन !

लोकमान्य म्हणजे बाळ गंगाधर टिळक हे समीकरण इथून पुढेही जोवर मराठी भाषा जिवंत असेल, तोवर टिकून राहो, लोकमान्यांच्या विचारांना कृतिशीलतेची पावले लाभोत आणि टिळकांचे विचार चिरंजीव होवोत, या चिमण्या प्रार्थनेसह ‘सिंहगर्जनेचे सिंहावलोकन’ इथेच पुरे करतो… 

– समाप्त –

लेखक : श्री पार्थ बावसकर 

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ११ — विश्वरूपदर्शनयोग — (श्लोक ३१ ते ४०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ११ — विश्वरूपदर्शनयोग — (श्लोक ३१ ते ४०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

*

आख्याहि मे को भवानुग्ररूपोनमोऽस्तु ते देववर प्रसीद ।

विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यंन हि प्रजानामि तव प्रवृत्तिम्‌ ॥३१॥

*

कसले हे उग्र रूप आपले देवश्रेष्ठा नमन तुला

प्रसन्न व्हा आदिपुरूषा दावी गुण ना तव रूपाला ॥३१॥

श्रीभगवानुवाच

कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धोलोकान्समाहर्तुमिह प्रवृत्तः ।

ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः ॥३२॥

कथित श्री भगवान

महाकाल मी नाशकर्ता तिन्ही लोकांचा

या समयाला या योद्ध्यांचा अंत व्हायाचा

शस्त्रसज्ज होउनी होई युद्धाभिमुख पार्थ

तव कर्माविनाही यांचा नाश आहे खचित ॥३२॥

*

तस्मात्त्वमुक्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून्भुङ्‍क्ष्व राज्यं समृद्धम्‌ ।

मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्‌ ॥३३॥

*

जिंकण्यास शत्रूला समरी यशःप्राप्ति करण्या 

युद्धास्तव उत्तिष्ठ भवान समृद्ध राज्य भोगण्या

तू तर केवळ कारण होशिल वीरांच्या या मृत्यूचा

सव्यसाची हे केला मीच अंत तयांच्या जीवनाचा ॥३३॥

*

द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथान्यानपि योधवीरान्‌ ।

मया हतांस्त्वं जहि मा व्यथिष्ठायुध्यस्व जेतासि रणे सपत्नान्‌ ॥३४॥

*

द्रोण भीष्म जयद्रथ कर्णादि वीरांचा मम हस्ते अंत

साधन होउनिया माझे युद्धात करी तू त्यांचा अंत

विजयी होशिल या समरात हाचि कालाचा लेख

शंकित होउनिया मानसी होई ना तू युद्धपराङ्मुख ॥३४॥

संजय उवाच

एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य कृतांजलिर्वेपमानः किरीटी ।

नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णंसगद्गदं भीतभीतः प्रणम्य ॥३५॥

कथित संजय

ऐकुनिया ही केशववाणी अर्जुन भयभीत

प्रणाम करता झाला कृष्णा कंपित जरी हस्त

लीन होउनी पूरभु चरणांसी भावभरा तो स्वर 

व्यक्त करोनी भाव आपुले कथिता होई सत्वर ॥३५॥

अर्जुन उवाच

स्थाने हृषीकेश तव प्रकीर्त्या जगत्प्रहृष्यत्यनुरज्यते च ।

रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्‍घा: ॥३६॥

*

मुदित होतसे तुझ्या कीर्तने  इहलोक समस्त

धन्य जाहले तव अनुराग तयांस होता प्राप्त

समग्र सिद्धसमुदाय होत तव चरणांवर नत

असूर सारे करित पलायन होउनिया भयभीत ॥३६॥

*

कस्माच्च ते न नमेरन्महात्मन्‌ गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे ।

अनन्त देवेश जगन्निवास त्वमक्षरं सदसत्तत्परं यत्‌ ॥ ३७ ॥

*

ब्रह्माचे आदिकर्ता अनंत सर्वश्रेष्ठ महात्मन

सदसत्परे अक्षर  देवेश ब्रह्म सच्चिदानंदघन 

तव चरणी लीन होउनी सर्वस्वाचे समर्पण 

शरण पातलो हे भगवंता तुम्हासी करितो नमन ॥३७॥

*

त्वमादिदेवः पुरुषः पुराणस्त्वमस्य विश्वस्य परं निधानम्‌ ।

वेत्तासि वेद्यं च परं च धाम त्वया ततं विश्वमनन्तरूप ॥३८॥

*

आदिदेवा पुराणपुरुषा संरक्षण करुनी पाळता  तुम्ही या विश्वाला

अनन्तरूपी हे परमेशा परिपूर्ण अहात व्यापुनी अखिल जगताला ॥३८॥

*

वायुर्यमोऽग्निर्वरुणः शशाङ्‍क: प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च।

नमो नमस्तेऽस्तु सहस्रकृत्वः पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते ॥३९॥

*

अनल अनिल वरुण सोम प्रजापति ब्रह्मा ब्रह्मपिता

पुनःपुनः सहस्रावधी नमन तुम्हा चरणी हे जगत्पिता ॥३९॥

*

नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व। 

अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वंसर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः ॥४०॥

*

आदि ना अंत तव सामर्थ्या अष्टदिशांनी नमन तुम्हा

विश्वव्यापी सर्वरूपी अतिपराक्रमी प्रणाम असो तुम्हा ॥४०॥

 

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिलक  !” भाग –१ —लेखक : श्री पार्थ बावसकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

(२३ जुलै १८५६ – १ अगस्त १९२०)

☆ “इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिलक  !” भाग –१ —लेखक : श्री पार्थ बावसकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

कुणी चितेजवळ रडत होतं, कुणी राख छातीशी घेत होतं : टिळक गेले त्या वेळची गोष्ट…

“आई, या पावसाला आणि गर्दीला घाबरू नकोस! अगं, टिळकांकरिता खुद्द देवसुद्धा रडत आहेत. मा! लुक हिअर, इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिळक!”

“हजारो लोक मुंबईच्या सरदारगृहापुढे रस्त्यावर उभे होते. अखेर मध्यरात्र उलटली. १२ वाजून गेले. १ ऑगस्ट १९२०चा दिवस सुरु झाला आणि थोड्या वेळानेच लोकमान्यांचे देहावसान झाल्याची बातमी कोणीतरी लोकांना सांगितली. त्या क्षणी त्या प्रचंड जनसमुदायाच्या तोंडून शोकाचे आणि दुःखाचे विदारक उद्गार बाहेर पडले. त्याचे स्मरण झाले की, अजूनही अंगावर कंप उठतो. काही लोक तर धाय मोकलून रडले. ज्यांचे डोळे पाण्याने भरुन आले नाहीत, असा एकही माणूस त्या जनसमुदायात आढळला नसता. लोकमान्यांच्या मृत्यूची बातमी एखाद्या वाऱ्याप्रमाणे मुंबई शहरात ताबडतोब पसरली, मग रात्री झोप कोणाला येणार? लोकमान्यांची आठवण करून सारी मुंबईनगरी त्या रात्री अक्षरशः ढळाढळा रडली, असे म्हटले तर त्यात एका शब्दाचीही अतिशयोक्ती होऊ नये.”

टिळक गेल्यानंतरचे हे उद्गार आहेत आचार्य अत्रेचे!

ते स्वतः त्या गर्दीचा एक भाग होते.

टिळक गेल्याचे समजले आणि गर्दी आणखीन वाढली.

त्याच रात्री मुंबईत गडकऱ्यांच्या ‘भावबंधन’ नाटकाचा प्रयोग सुरु होता. बाराशे रुपयांची तिकीट विक्री होऊन प्रयोग हाऊसफुल्ल झालेला. चौथा अंक सुरू झाला आणि आत काहीशी गडबड ऐकू आली. मंचावर घनश्यामच्या भूमिकेतले चिंतामणराव कोल्हटकर थांबले. तेवढ्यात तात्यासाहेब परांजपेंनी विंगेत येऊन टिळक गेल्याची वार्ता सगळ्या जनसमुदायाला सांगितली.

खेळ आपसूकच बंद झाला. ज्यांना तिकिटाचे पैसे परत हवे, त्यांना ते मिळतील, अशी सूचना देण्यात आली आणि पैसे परत करण्यासाठी एक माणूस तिकीटबारीवर जाऊन थांबला… .. पण, पैसे मागायला कुणी येईचना, सुमारे हजाराचा तो रसिकवर्ग एकाएकी उठला सरदारगृहाच्या दिशेने टिळकांना अखेरचे बघण्यासाठी निघाला. टाचणी पडली तरी भलामोठा आवाज यावा, असा सन्नाटा थिएटरभर पसरला होता.

या प्रसंगाचे साक्षी असलेले चिंतामणराव कोल्हटकर लिहितात,

“पायांचे आवाजसुद्धा ऐकू येऊ नयेत इतक्या शांततेत लोक बाहेर पडले. जमिनीला कान लावून ऐकणाऱ्यालासुद्धा ऐकू आले असते ते फक्त दुःखाचे निश्वास आणि रडण्याचे उसासे!”

रडण्याचे कढ हळूहळू वाढतच चालले होते. लोकमान्यांचे दर्शन घेण्यासाठी सरदारगृहाचे दार तोडण्यापर्यंत गर्दीची मजल गेली होती. शेवटी लोकांच्या दर्शनार्थ पहिल्या मजल्याच्या बाल्कनीत टिळकांचा देह आणून ठेवला, हा प्रसंग जसाच्या तसा लिहून ठेवणारे पुंडलिकजी तिथे उपस्थित होते.

ते सांगतात,

“प्रत्येक माणूस धडपडत टिळकांच्या दर्शनाला येई. टिळकांना बघितल्यावर त्याला भडभडून येत असे. एक माणूस म्हणाला, एका माणसाने त्या शवापुढे येताच आपल्या तोंडावर हातच मारून घेतला. एक म्हातारा मनुष्य म्हणाला, बाबा आता हिंदुस्थानला इंग्रजांच्या तावडीतून कोण सोडवणार रे?” असे म्हणून मोठ्याने किंकाळी फोडून तो रडूच लागला.

“श्री शिवाजी महाराजांचा मृत्यू, राजारामाचे अकाली मरण, पानिपतचा रणसंग्राम, नारायणराव पेशव्यांचा वध, सवाई माधवरावांची आत्महत्या अथवा नाना फडणवीस यांचा स्वर्गवास, या महाराष्ट्राच्या इतिहासातील ज्या भयंकर विपत्ती, त्यांच्याहून अणूमात्रही कमी नसलेली भयंकर वेळ आज महाराष्ट्रावर आलेली असून, तिने महाराष्ट्रातून आज बाळ गंगाधर टिळक यांना ओढून नेलेले आहे,” अशा शब्दांत या महानिर्वाणाचे वर्णन केले अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी।

टिळकांच्या पुण्यात ही बातमी समजली आणि पुणेकरांची मनेच हादरली. रडू आवरत कसेबसे लोक मुंबईला जायला निघाले. नेहमीच्या दोन रेल्वे कमी पडल्या. सरकारला ज्यादा गाड्यांची व्यवस्था करावी लागली.

टिळकांचे अंत्यसंस्कार पुण्यात व्हावे, अशी केळकरांची आणि सगळ्या पुणेकरांची इच्छा होती; इच्छा कसली त्यांचा हट्टच होता, नव्हे नव्हे हक्कही होता त्यांचा. कारण, पुणे ही टिळकांची कर्मभूमी! पण, मुंबईकरही हट्टाला पेटले होते. त्यांचेही म्हणणे बरोबरच होते, टिळकांची कर्मभूमी पुणे असली तरी ते आता एकट्या पुण्याचे राहिले नसून अवघ्या महाराष्ट्राचे ‘लोकमान्य’ झालेले होते.

तात्यासाहेब केळकर निघाले. पुण्याला आले. त्यांना ‘ केसरी ‘चा पुढचा अंक काढण्याची खटपट करावी लागणार होती. याच ‘केसरी’च्या आधीच्या अंकातून लोकांना सांगण्यात आले होते, लोकमान्यांची प्रकृती मलेरियाच्या तापाने थोडी बिघडली आहे, पण काळजी करण्याचं काही कारण नाही. लोकमान्य लवकरच ठणठणीत होतील..

आधीच्या अंकात ही बातमी वाचणाऱ्या वाचकांना हे कुठे माहिती होतं की, पुढच्या ‘केसरी’च्या अंकात टिळकांच्या मृत्यूची काळीज करपून सोडणारी बातमी आपल्याला वाचावी लागणार म्हणून ! ‘केसरी ‘चा हा अंक महाराष्ट्रातल्या घराघराला एक अकल्पित वज्राघातच वाटला.

ही बातमी अंदमानात सावरकरांना समजली त्यांनी आणि अंदमानातल्या सगळ्याच् कैद्यांनी एक दिवस अन्नपाणी घेतले नाही. टिळकांना आदरांजली म्हणून उपवास पाळला.

आणि इकडे मुंबईत, अफाट लोकसमुदायाबरोबर टिळकांची महानिर्वाणयात्रा दुपारी दीड वाजता सुरू झाली. दोन लाखांच्यावर लोकांची गर्दी यापूर्वी एखाद्या अंत्ययात्रेला कधीही झालेली नव्हती. स्त्रिया, पुरुष, म्हातारे, हजारो गिरणी कामगार, हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती, पारशी, जैन, हरेक भारतीय टिळकांचा जयजयकार करत चालला होता.

आकाशाची शिवण उसवावी, आभाळ फाटावे असा पाऊस त्यादिवशी पडत होता. टिळकांच्या चितेला अग्नी दिलाच जाऊ नये, अशी त्या वरुणाचीही इच्छा असावी बहुतेक. त्या पावसाच्या घनगंभीर अशा मेघगर्जनेपेक्षा टिळकांच्या महानिर्वाणयात्रेतील लोकगर्जना अवघा महाराष्ट्र हलवून सोडत होती, ती गर्जना होती, ‘टिळक महाराज की जय!’ लोक घराच्या खिडकीतून अंत्ययात्रा पाहत होते. टिळकांना अखेरचा नमस्कार करत होते. घराच्या गच्चीवरून पुष्पवृष्टी होत होती. माणसांच्या गर्दीत मुंगीलाही उभे राहता येत नव्हते. खापर्डे, गांधी हेही लोकांच्या जथ्थ्यात हेलकावे खात इकडून तिकडे ढकलले जात होते.

या महानिर्वाणयात्रेत ३५-४० वर्षांचा एक ख्रिस्ती तरुण साठीच्या पलीकडे झुकलेल्या आपल्या म्हाताऱ्या आईला घेऊन तेथे आला होता. लोकमान्यांच्या अखेरच्या दर्शनासाठी ती ख्रिस्ती म्हातारी हेलकावे खात होती. तिचा जर्जर देह इकडून तिकडे फेकला जातो की काय, अशी अवस्था होती. हे पाहून तिचा मुलगा म्हणाला,

आई, या पावसाला आणि गर्दीला घाबरू नकोस! अगं, टिळकांकरिता खुद्द देवसुद्धा रडत आहेत. मा ! लुक हिअर, इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिलक!”

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : श्री पार्थ बावसकर 

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ब्रह्मर्षी अंगिरा ऋषी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

 कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? इंद्रधनुष्य ?

☆ ब्रह्मर्षी अंगिरा ऋषी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

अग्नि वायु रविभ्यस्तु त्र्यं ब्रह्म सनातनम |

दुदोह यज्ञसिध्यर्थमृगयु:  समलक्षणम् ||

अर्थ:-  परम्यात्माने सृष्टीमध्ये मनुष्याला निर्माण करून चार ऋषींकडून चार वेद ब्रम्हाला प्राप्त करून दिले. त्या ब्रह्माने अग्नी, वायू, आदित्य आणि तू म्हणजेच अंगिरा ऋषींकडून चार वेदांचे ज्ञान प्राप्त केले. असे मनुस्मृतीमध्ये लिहिले आहे. म्हणजेच अग्नी, आदित्य, वायू आणि अंगिरा ऋषींकडून ब्रह्मा ने  वेदांचे ज्ञान प्राप्त केले.

ब्रह्मर्षी अंगिरा वैदिक ऋषी होते. त्यांना प्रजापती असेही म्हणतात. त्यांच्या वंशजांना अंगीरस असे म्हणतात. त्यांनी अनेक वैदिक स्तोत्रे आणि मंत्र यांची निर्मिती केली. 

अथर्ववेदाला अथर्व अंगीरस असेही नाव आहे.त्यांचे अध्यात्मज्ञान दिव्य होते. त्यांच्याकडे योग बल, तपसाधना व मंत्र शक्ती खूप होती.

अग्नीचं एक नाव अंगार असे आहे. एकदा अग्नीदेव पाण्यात राहून तपसाधना करत होते. जेव्हा त्यांनी अंगिरा ऋषींना पाहिले, त्यांचे तपोबल पाहिले तेव्हा ते म्हणाले, हे महर्षी, तुम्हीच प्रथम अग्नी आहात. तुमच्या तेजासमोर मी फिका आहे. तेव्हा अंगिरा ऋषींनी अग्नीला देवतांना हविष्य पोहोचवण्याचं मानाचं काम दिलं. तेव्हापासून यज्ञामध्ये अग्नीला आहुती देऊन देवतांना हविष्य प्राप्ती देण्याची प्रथा सुरू झाली. अंगीरा ऋषींनी आपल्या छोट्या आयुष्यात खूप मोठे ज्ञान संपादन केले असे मनुस्मृतीमध्ये लिहिलेले आहे. ते लहान असतानाच मोठे मोठे लोक त्यांच्याकडे येऊन शिक्षण घेत असत. एकदा ते म्हणाले,

पुत्र का इति‌ होवाच ज्ञानेन परिगृह्य तान् |

ते ऐकून तेथे बसलेल्या अनेक वृद्धांना राग आला. त्यांनी देवांकडे तक्रार केली. तेव्हा देव म्हणाले, अंगिरा योग्य बोलले ,कारण …. 

न तेन वृद्धो भवती येनास्य पलीतं शिर: |

यो वै युवाप्यधीयानस्तं देव: स्थविरं विदु: ||

अर्थ:-डोक्यावरचे सगळे केस पांढरे झाले म्हणजे माणूस वृद्ध होत नाही. तरुण असूनही जो ज्ञानी असतो त्याला वृद्ध म्हणतात. तेव्हा  सर्व वृद्धांनी अंगिरा ऋषींचे शिष्यत्व पत्करले.महर्षी भृगु ,अत्री यांच्यासारख्या अनेक ऋषींनी अंगिराजींकडून ज्ञान प्राप्त केले. राजस्थान येथील अजमेर येथे महर्षी अंगिरा आश्रम आहे.महर्षी शौनक यांना त्यांनी परा आणि अपरा या दोन विद्या शिकवल्या.

त्यांना स्वरूपा, सैराट, आणि पथ्या अशा तीन पत्नी होत्या. स्वरूपा मरीची ऋषींची कन्या. तिच्यापासून बृहस्पतीचा जन्म झाला. बृहस्पती  देवांचे गुरु.त्यांना खूप मुले झाली. सैराट किंवा स्वराट् ही कर्दम ऋषींची कन्या.तिचे पुत्र महर्षी गौतम, प्रबंध, वामदेव उतथ्य आणि उशीर.  पथ्या ही मनु ऋषींची कन्या.तिचे पुत्र विष्णू, संवर्त, विचित, अयास्य  असीज. महर्षी संवर्त यांनी वेदातील ऋचा रचल्या. त्यांनी अंगीरास्मृती हा ग्रंथ रचला. अंगिरा ऋषींना अनेक मुले झाली. देवांचे शिल्पकार ऋषी विश्वकर्मा हे त्यांचे नातू.

त्यांच्याबद्दल म्हणतात …. 

तुम हो मानस पुत्र ब्रह्मा के,

तुम सभी गुणोंमें  समान ब्रम्हा के,

दक्ष सुता स्मृती है भार्या तुम्हारी,

अग्नि से भी अधिक तेज तुम्हारा,

विश्वकर्मा जननी 

योगसिद्ध है सुता तुम्हारी,

ऋग्वेदमें वर्णन तुम्हारा जितना,

नही और किसी ऋषी का इतना,

ऋषी पंचमी पर मनाते जयंती तुम्हारी,

मंत्र तंत्र के ज्ञाता, नाम ऋषी अंगिरा तुम्हारा

 

….. अशा ब्रह्मर्षी अंगिरा यांना कोटी कोटी प्रणाम

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कुबेरकाठी — लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ कुबेरकाठी — लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

महादेवराव शिर्के सरकार म्हणजे सातार जवळच्या एका गावातलं बडं प्रस्थ. स्वभावाने अगदी लाख मोलाचा माणूस. दहा गावाचं वतन असलं तरी बोलण्यात काडीचाही माज नाही की अहंकार नाही. तालेवारापासून गोरगरिबांपर्यंत प्रत्येकाला आदराने वागवणार, म्हारामांगाच्या पोरींबाळींनाही ताई-माई असं आदरार्थी संबोधणार, आदराने अदबीने चौकशी करणार. 

त्यामुळे सरकारांबद्दलही गावच्या पंचक्रोशीत सगळ्यांना माया होती, जिव्हाळा होता. एकदा असंच कुठंसं वाचलं नी सरकारांच्या डोक्यात नर्मदा परिक्रमा करायचं खुळ घुसलं, अहो ही कथा आहे सत्तरऐंशी वर्षापूर्वीची, तेव्हा ना गाड्या ना बस अशा वेळी नर्मदा परिक्रमा करायची म्हणजे खुळच नव्हे तर काय. पण आलं सरकारांच्या मना तिथं देवाचं चालंना अशातली गत होती. 

मग काय एकदा मनात आलं आणि महिनाभरात सरकारांनी प्रस्थान केलं. पार अगदी मुंडन वगैरे करुन, यथासांग अकरा महिन्यात त्यांनी परिक्रमा पूर्ण करुन गावी आले देखील… छान पारणं करायचं ठरवलं. गावाच्या शेजारच्या परिसरातील ब्राह्मणांना भोजन द्यावं असं सरकारांच्या मनी आलं…. 

विष्णुशास्त्री अभ्यंकरांना बोलावणं धाडलं गेलं…. विष्णुशास्त्री म्हणजे वेदपारंगत, प्रचंड बुध्दीमान आणि करारी ब्राह्मण होते. गावात कुठेही रुद्रावर्तन, महारुद्र, दूर्गापाठ असला की विष्णुशास्त्रींशिवाय चालत नसे. शास्त्रीबुवा आले सरकारांना भेटायला….

“बोला सरकार…” शास्त्रीबुवा म्हणाले. 

शिर्केसरकारांनी सदरेवरुन उठून शास्त्रीबुवांना साष्टांग नमस्कार केला…

“सरकार, तुमच्या परिक्रमेविषयी समजलं. मी येणारच होतो तुम्हाला भेटायला आणि वृत्तांत ऐकायला. अहो कठीण असते हो परिक्रमा… तुमचं कौतुक वाटतं सरकार. संपत्तीच्या रुपाने प्रत्यक्ष लक्ष्मीमाता तुमच्या घरी पाणी भरत असतानाही तुम्ही सरस्वती मातेशी सख्य जपून ठेवलं आहे. तुमचा आध्यात्माचा, धर्माचा व्यासंग उत्तम आहे. आणि त्यात तुम्ही परिक्रमेसारखी दिव्य गोष्टही तितक्याच सुरेखपणे करता हे विशेष आहे. असा ज्ञान, विद्वत्ता आणि धनाचा संगम क्वचितच बघायला मिळतो. बरं बोला…काय काम काढलंत मजकडे?” शास्त्रीबुवांनी विषयालाच हात घातला. 

“त्याचं असं शास्त्रीबुवा, मला परिक्रमेवरुन सुखरुप आल्यानं पारणं करायचंय, गंगापूजनही करायचं आहेच. ते झाल्यावर दुसऱ्या दिवशी ब्राह्मणभोजन घालायचं आहे. त्याची नियोजनाची जबाबदारी मी तुमचेवर सोपवतो…कितीही माणसं येऊ देत…”

“ठीक आहे…” इतकं बोलुन शास्त्रीबुवा निघाले. 

तिथून निघून घरी येत असताना महारवाड्यावरुनच वाट जात होती. त्याकाळी विष्णुशास्त्री हे जितके बुध्दीमान ब्राह्मण होते, ज्ञानी होते हे सत्य असलं तरी ते जातपात आणि शिवाशिव मानत नसत. ही बाब अनेकांना खटकायची, दोन वेळा तिथल्या ब्रह्मवृदांनी त्यांना सहा सहा महिने वाळीत टाकलंही होतं… पण ते नसले की अनेक धर्माकर्माची कामं अडून रहायची. आणि विष्णूशास्त्री काही सुधारण्यातले नव्हते त्यामुळे आता त्यांच्या या  मोकळ्याचाकळ्या वागणूकीकडे सोयिस्कर दुर्लक्ष करण्याची लोकांना सवय झाली होती. 

महारवाड्यात सुमसाम शांतता होती. पारावर गोपाळ, शनवाऱ्या, बापू असे चारपाच लोक बसलेले होते. शास्त्रीबुवांना बघून ते जागेवरुन उठले, नमस्कार केला… परिसरात या वर्षी दुष्काळ पडला होता. प्रत्येकाचे खायचे वांधे झाले होते, पोरं उपाशीच होती. कशीबशी पेज पिऊन दिवस कंठणं सुरु होतं… काय करावं ते समजत नव्हतं. शास्त्रीबुवांनी सगळं ऐकलं…

”बापू, एकूण किती डोकी आहेत रे महारवाड्यात तुमच्या… धाकली, कडेवरची, धावती आणि म्हातारी कोतारी पकडून सगळी सांग…” शास्त्रीबुवा विचारते झाले.

बापूने माणसं मोजायला सुरुवात केली. तो नावं घेत होता, शास्त्रीबुवा माणसं मोजत होते… तब्बल ९६ लोक झाले…घरी जाण्याऐवजी शास्त्रीबुवा पुन्हा वाड्याच्या दिशेने उलट फिरले…

***

“पण…पण शास्त्रीबुवा… हे कसं शक्य आहे” सरकार म्हणाले, “लक्षात घ्या, मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. पण मला ब्राह्मणभोजन घालायचं आहे… गावजेवण मी देईन की सवडीने… त्यात काय मोठंसं…? पण…..”

“सरकार, तुम्ही बोललात की तुम्ही माझ्या शब्दाबाहेर नाहीत… बरोबर… बघा श्रीमद्भग्वद्गीतेत उल्लेख आहे प्रत्यक्ष भगवानच म्हणतात की _“अहं वैश्वानरो भुत्वा, प्राणिनां देहमाश्रिता:… म्हणजे समस्त जीवांच्या पोटी भुकेच्या रुपाने असणारा वैश्वानर नावाचा अग्नि म्हणजेच मी… सरकार, हे बघा तुम्ही ब्राह्मणभोजनाची जबाबदारी मजवर सोपवलीत म्हणजे मी काय करणार तर साताऱ्यापासून वडूजपर्यंत सगळ्या गावातली ब्राह्मणमंडळी गोळा करुन आणणार… चारशे ब्राह्मण होतील… जे ते घरी जेवणार ते इथे येऊन जेवतील. बरोबर आहे? तर जिथे खरी जिवंत भूक आहे त्या पोटांना चार चांगले घास द्यायला हवेत तर तुम्हाला शतपटीने पुण्य लाभेल महादेवराव…

“आणि अहो ब्राह्मण म्हणजे कोण हो? चार वेद येतात तो ब्राह्मण नाही… ब्रह्म जानाति इति ब्राह्मण:… जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण… आणि ही गावकुसाबाहेरची उपाशी जनता आहे ना, ती नुसतं ब्रह्म जाणत नाही तर पोटातली आग, तो वैश्वानर म्हणजेच प्रत्यक्ष परमेश्वर ती आग जागी ठेवतो. या भयाण दुष्काळातही ती मंडळी पेजपाणी पिऊन दिवस ढकलतात पण चोरीमारी करत नाहीत… तेच खरं जिवंत ब्रह्म हो…!” 

सरकार निरुत्तर झाले, त्यांचे डोळे ओले झाले. विष्णुशास्त्रींना साष्टांग नमस्कार केला…

***

पुढच्या गुरुवारी पंगत बसली… सदरेवर चारशे ब्राह्मण आणि अंगणात शंभरेक महार असा सोहळा पार पडला…सगळ्यांना एकच वागणूक होती, तसेच सारखेच पदार्थ होते… जिथे ब्रह्मवृदांना केशरीभात होता तिथे महारांनाही केशरीभात, पुऱ्या, भात, आणि इतर पक्वान्नांचं साग्रसंगीत भोजन होतं. भोजनोत्तर प्रत्येकाला दक्षिणा दिली गेली. बायकांना साडीचोळी दिली गेली… ब्राह्मणांसोबत महारही तृप्त होऊन निघू लागले…

सरकार आणि विष्णुशास्त्री सदरेच्या जवळ अंगणात उभे राहून हा अन्नपूर्णेचा तृप्त सोहळा भरल्या डोळ्यांनी बघत होते. इतक्यात एक वृध्द महार जवळ आला, दोघांनाही त्याने खाली लवून नमस्कार केला…

”बोला आजोबा…काय म्हणताय? झालं का जेवण?” सरकारांनी विचारलं.

“व्हय…झालं जी… मन तृप्त झालं… लई दिसांनी आसं ग्वाड जेवान मिळाळं खायला… दक्षिणा बी मिळाली”

“मग… अजून काही हवंय का?” शास्त्रीबुवा विचारते झाले.

“न्हाई… पण या बदल्यात मला तुम्हाला काही द्यायचंय… ते स्विकार करा…”

सरकार आणि शास्त्रीबुवा एक क्षण स्तिमित झाले… डोकं जड झाल्यागत झालं दोघांचं…

त्या म्हातारबुवांनी खांद्यावरच्या झोळीतून हात घालून दोन फुटभर लांबीच्या काठ्या काढल्या… काळ्याकभिन्न, शिसवी आणि चकचकीत पॉलिश कराव्यात तशा… दोघांच्या हातात दिल्या… खरं म्हणजे आता शिवायचं नाही वगैरे दोघे क्षणभर विसरुन गेले… कसल्यातरी संमोहनाचा असर होता की काय देव जाणे?

“याला कुबेरकाठी म्हणतात… आत जंगलात गावते… ही अशीच ठेवायची… तिजोरीत, जपून ठेवायची… काही करायचं नाही. फक्त वर्षातून एकदा रामनवमीला बाहेर काढायची, पूजा अर्चा करायची. शक्य होईल तसं गावजेवण किंवा गरीबांना भोजन घालायचं आणि सूर्यास्ताला परत ठेऊन द्यायची आत, ती पुन्हा पुढच्या रामनवमीलाच काढायची… तुम्हा दोघांना काही कमी पडणार नाही… तुमच्या पुढच्या जितक्या पिढ्या हा नियम पाळतील तेवढे दिवस तेवढी वर्षे ही काठी तुमच्याकडे असेल… नावासारखीच आहे ही कुबेरकाठी… कुबेराची धनसंपत्ती देणारी…” इतकं बोलून तो म्हातारबा निघून गेला…

पुढच्याच क्षणी दोघे भानावर आले… काय झालं ते समजायला मार्गच नव्हता… आसपास धावाधाव करुन शोध घेतला तर समजलं असा कोणी म्हातारबा महारवाड्यात नाहीच आहे मुळात… तो काठी टेकत टेकत असा कितीसा दूर गेला असेल? पण आठी दिशांना माणसं पाठवून कोणी दिसलं नाही तेव्हा हा चमत्कार आहे  हे दोघांच्याही ध्यानात आलं…!

***

आज सत्तरऐंशी वर्षे झाली या घटनेला तरीही रामनवमी असली की शिर्के आणि अभ्यंकर घराण्याचे सध्याचे वंशज एकत्र येतात. दोन्ही कुबेरकाठ्या अत्यंत गुप्तपणे बाहेर काढल्या जातात… 

दोन्ही काठ्यांचे यथसांग पूजन होते, विष्णूसहस्त्रनामाचा अभिषेक होतो… 

ही पूजा अतिशय गुप्तपणे कोणालाही समजणार नाही अशाप्रकारे होते. आणि मग गावजेवण, भंडारा होतो… शेकडो माणसं आजही जेवून जातात…

दोन्ही घराण्याचे आजचे वंशज एकमेकांशी मैत्री टिकवून आहेत…

दोन्ही घराण्यात या कुबेरकाठीच्या निमित्ताने एक विशेष प्रेमाचे स्नेहबंध निर्माण झाले आहेत. 

एकत्र “कॉलेबरेशन” मध्ये काही प्रोजेक्ट्सही सुरु आहेत… दरवर्षी भंडारा झाला की सध्याचे वंशज दुपारी १ वाजता एकत्र येतात, प्रवेशद्वाराकडे नजर ठेवून असतात… 

तिथे एक ते सव्वाच्या दरम्यान एक वृध्द व्यक्ती दिसते… त्याचं दर्शन लांबूनच घ्यायचं असा संकेत आजही पाळला जातो… तो वयोवृध्द आजोबा जेवून निघालेला असतो… तो मागे वळतो या दोघांकडे कटाक्ष टाकतो, त्यांनी लांबूनच केलेल्या नमस्काराचा सस्मित चेहऱ्याने स्विकार करतो आणि काठी टेकत निघून जातो. संध्याकाळी सूर्यास्ताच्या आत काठ्यांना घरातील मंडळी साष्टांग नमस्कार करतात… आणि दोन्ही कुबेरकाठ्या आपापल्या तिजोरीत बंदिस्त होतात… त्या पुढच्या रामनवमीला तिजोरीबाहेर येण्यासाठीच…!!!

(कथा सत्य आहे. तपशील, गावाची नावे, आडनावे यात बदल केले आहेत… अधिक सविस्तर डिटेल्स विचारु नयेत. कथेचा आनंद घ्यावा आणि कथा सत्य की असत्य? हे ठरविण्याचा अधिकार वाचकांनाच आहे )

लेखक/संकलक  : अनामिक

प्रस्तुती – श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हसणं :  शिकायची बाब ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ हसणं :  शिकायची बाब !… ☆ श्री संभाजी बबन गायके 

काही मानवसदृश प्राण्यांचे चेहरे हसरे वाटू शकतात..पण ते हसू शकतात हे अजून सिद्ध झालेले नाही! एका हिंस्र प्राण्याचा आवाज माणसाच्या हसण्याशी साधर्म्य दाखवणारा आहे,पण त्याच्या जवळ गेले की माणसाचे हसणे भूतकाळात जमा होऊन जाण्याची शक्यता अधिक! अस्वल माणसाला गुदगुल्या करून करून मारून टाकते,असे कशावरून सांगतात ते न कळे!

मग राहता राहिला माणूस. हा प्राणी मात्र हसू शकतो. याचे हसण्याचे प्रकार नानाविध असतात,हेही खरेच.

कुणी इतरांना हसतो. कुणी कसंनुसं हसतो. स्वतःवर हसणारी माणसं तशी विरळाच असतात. अतीव दुःखातही एक उदास हसू चर्येवर उमटू शकते..नशीब थट्टा मांडते तेंव्हा !

हसवणे तसे बरेच सोपे असते..कारण माणसं फारसा विचार न करता हसू शकतात. किंवा आधी हसून घेऊन मग दातांनी ओठ चावून,किंवा जीभ बाहेर काढून काही क्षण दातांखाली दाबून ठेवून पश्चात्ताप व्यक्त करतात!

शेजारचा हसतो म्हणून काही माणसं मिले सूर मेरा तुम्हारा चालीवर हसतात.. विशेषतः इंग्लिश सिनेमा बघताना असे व्हायचे पूर्वी. दूरदर्शन मालिका वाल्यांनी मग पूर्व ध्वनिमुद्रित हास्य ऐकवून श्रोत्यांना इथे तुम्ही हसणे अपेक्षित आहे,असा दम देण्याचा प्रघात सुरू केला. हसताय ना? असं विचारून हसायलाच पाहिजे अशी गळ ही घातली जाते! Bench वर या शब्दाची शिवी करूनही हसण्याच्या जत्रेत रेवड्या वसूल केल्या जातात! दोन अर्थ निघतील..नव्हे काढलेच जातील अशी खात्री असलेल्यांचे दिवस होऊन गेलेत! अंगविक्षेप आणि डोळ्यांसह मुखविक्षेप करून हास्य सम्राट सुद्धा झालीत माणसं. मराठी भाषा किंवा कोणतीही भाषा अशुद्ध किंवा शुद्ध नसते..ती फक्त निराळी असू शकते! नव्हते जर शुद्ध तर व्हते अशुद्ध कसे? पण इतरांच्या निराळ्या शब्दोच्चारांचा विनोदाच्या अंगाने आपल्या बोलण्यात,लिहिण्यात उपयोग करून हशा वसूल करणारी उचली मंडळी सुद्धा आढळतात!

मनात शुद्ध हास्याचे कारंजे निर्माण करणाऱ्यांच्या नभोमंडलात सर्वाधिक तेजस्वी आणि तरीही नेत्रसुखद, कर्णसुखद माणूस म्हणजे.. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे नावाचे अवलिया !

यांनी हसायला शिकवले ! 

त्यांच्या स्मृतीने हसू न येता हात आपोआप जोडले जातात.. हे त्यांचे बलस्थान !

स्वर्गस्थ देवता आणि तत्सम अधिकारी आता ‘पुल’ नावाच्या आत्म्याला पुनर्जन्म देण्याची चूक करणार नाहीत…त्यांनाही स्वर्गात हसवायला ‘पुल’ कायमचे पाहिजे आहेत..नाही का?

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एकची विठ्ठल सावळा, ज्याचा त्याचा वेगळा ! – लेखक :  श्री मकरंद करंदीकर ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? इंद्रधनुष्य ? 

☆ एकची विठ्ठल सावळा, ज्याचा त्याचा वेगळा ! – लेखक :  श्री मकरंद करंदीकर ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

(विविध व्यवसायाच्या संतांच्या दृष्टीतून)

विठ्ठलाचे रूप म्हणजे शेकडो वर्षाच्या मराठी संस्कृतीचे एक खूपच वेगळे स्वरूप आहे ! सगळ्या  भक्तांचा, जातीपातींचा, व्यावसायिकांचा, बलुतेदारांचा तो देव ! मातीसारखा, अत्यंत वात्सल्याने भरलेल्या धरतीसारखा !! जेवढे तुम्ही पेराल त्याच्या कितीतरी पटीने तो तुम्हाला परत करतो. बरं त्याला तुमच्याकडून हवं तरी काय तर फक्त तुमची भक्ती, तुमचे शब्द, तुमचं प्रेम याचा तो भुकेला..

या विठ्ठलाने शेकडो वर्षे, महाराष्ट्राची अध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक, संगीत, कला अशी सगळीच क्षेत्रे समृद्ध केली. अठरापगड जातींच्या समाजाला भक्तीसमृद्ध केले. अध्यात्मातील चारीही मुक्तींचा सोपा मार्ग, समाजातील शेवटच्या पायरीवरील माणसांनाही कळला. पुरुषसूक्तात जरी ” ब्राह्मणोऽस्य मुखमासीद् ” अशी उपमा दिली असली तरी जगातील कुठलाही हिंदू ( अगदी ब्राह्मणसुद्धा ) हा देवाच्या मुखाला हात लावून नमस्कार करीत नाही. परंतु  ” पद्भ्यां शूद्रो अजायत ” अशी उपमा  दिलेल्या  पायांनाच हात लावून, पायांवर डोके ठेवूनच नमस्कार केला जातो.

संत ज्ञानेश्वरांनी संस्कृत भगवतगीता प्राकृतात आणली आणि मराठीत एक अध्यात्मिक क्रांतीच झाली. येथे त्यानंतर तत्कालीन समाज व्यवस्थेतील प्रत्येक जाती व्यवसायात थोर संत होऊन गेले. अनेकांचा विविध कारणांनी छळ झाला तरी त्यांनी विठ्ठलाला सोडले नाही. खुद्द ज्ञानेश्वर माउलींनी, त्यांच्या कुटुंबीयांचा अपरिमित छळ होऊनही कुणालाही शिव्याशाप दिले नाहीत. उलट देवाकडे पूर्ण विश्वाच्या भल्याचे पसायदान मागितले.

नंतरच्या मांदियाळीतील  संतांच्या स्वभाव, व्यवसाय, कार्यानुभवांमुळे एकच विठ्ठल त्यांना कसा कसा दिसला, भावला हे पाहणे आपल्याला भावणारे आहे.

संत गोरा कुंभार आपल्या अभंगात ” देवा तुझा मी कुंभार । नासीं पापाचें डोंगर ” आणि  ” न लिंपेची कर्मीं न लिंपेची धर्मी । न लिंपे गुणधर्मी पुण्यपापा ” असे म्हणतात. 

संत नरहरी सोनार तर थेट विठ्ठलाला आपल्या व्यवसायातील वर्णन सांगतात — देवा तुझा मी सोनार । तुझे नामाचा व्यवहार ।। देह बागेसरी जाणे । अंतरात्मा नाम सोने ।। त्रिगुणाची करून मूस । आत ओतिला ब्रम्हरस ।। जीव शिव करूनी फुंकी । रात्रन्‌दिवस ठोकाठाकी ।। विवेक हातवडा घेऊन । कामक्रोध केला चूर्ण ।। मन बुद्धीची कातरी । रामनाम सोने चोरी ।। ज्ञान ताजवा घेऊन हाती । दोन्ही अक्षरे जोखिती ।। खांद्या वाहोनी पोतडी । उतरला पेंल थंडी ।। नरहरी सोनार हरीचा दास । भजन करा रात्रं दिवस ॥

संत सावता माळी यांना आपल्या मळ्यातील भाजीमध्येच विठ्ठल दिसतो.ते म्हणतात, “आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत, कांदा मुळा भाजी अवघी | विठाबाई माझी, लसुण मिरची कोथंबिरी | अवघा झाला माझा हरि || “

संत तुकाराम महाराज समाजातील जातीभेदाबाबत उपरोधकपणे म्हणतात, बरे देवा कुणबी केलों । नाहीं तरि दंभेंचि असतों मेलों II

संत जनाबाई त्यांना पडणाऱ्या तत्कालीन हलक्या कामांबद्दल म्हणतात — तैसाचि पैं संगें येऊनि बाहेरी । वेंचोनियां भरी शेणी अंगें ॥ ओझें झालें म्हणूनि पाठी पितांबरी । घेऊनियां घरीं आणितसे ॥

संत कान्होपात्रा या महान संत कवयित्री, जन्माने गणिका कन्या. त्यांचे सांगणे कांही वेगळेच ! — 

दीन पतित अन्यायी । शरण आले विठाबाई ।। मी तो आहे यातीहीन । न कळे काही आचरण ।। मज अधिकार नाही । शरण आले विठाबाई ।। ठाव देई चरणापाशी | तुझी कान्होपात्रा दासी ।।

संत चोखामेळा म्हणजे सर्वात साध्या भाषेत, सर्वात उच्च तत्वज्ञान  —— ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥१॥ कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥२॥ नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगें । काय भुललासी वरलिया रंगें ॥३॥ चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा ॥४ II

संत सोयराबाई या सहजपणे सर्वोच्च तत्वज्ञान सांगतात — अवघा रंग एक झाला । रंगी रंगला श्रीरंग ॥१॥ मी तूंपण गेलें वायां । पाहतं पंढरीच्या राया ॥२॥ नाही भेदाचें तें काम । पळोनी गेले क्रोध काम ॥३॥ देही असुनी तूं विदेही । सदा समाधिस्थ पाही ॥४॥ पाहते पाहणें गेले दुरी । म्हणे चोख्याची महारी ॥५II 

प्रत्येकाला दिसलेला विठ्ठल हा आपापल्या दृष्टीने दिसलेला आहे. पं. भीमसेन जोशी हे विठ्ठल हा शब्द गातांना दोन टाळ एकावर एक वाजविल्यासारखे ठणठणीत वाटतात तर श्रीधर फडके यांचा विठ्ठल, जरा अधिकच मृदू असतो. ग.दि.माडगूळकरही  विठ्ठलाला विविध घट बनविणारा ” वेडा कुंभार ” असे म्हणतात. जगदीश खेबुडकर ” ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी ( ठिणगी रुपी फुले ) वाहू दे ” असे म्हणतात.

आता आषाढी एकादशी आली आहे. लाखो वैष्णवांचा मेळा माऊलीभेटीला निघाला आहे. सर्वांचा विठ्ठल एकच, पण त्याचे दर्शन मात्र व्यवसाय, समाज, अनुभूती यांच्या विविध खिडक्यांमधून घेतले जाते. वारीमध्ये चालणारा, धावणारा, टाळकरी, माळकरी आणि ज्याला भेटायचे आहे तो, असे सगळेच ”  माऊली “! चंद्रभागेच्या तीरी या माऊलींच्या  रूपातील अवघा भक्ती रंग एकच ” विठ्ठल रंग ” होतो. मग सर्वांचे फक्त एकच काम उरते — बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव II

लेखक :  श्री मकरंद करंदीकर

संग्रहिका:  श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ११ — विश्वरूपदर्शनयोग — (श्लोक १ ते ११) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ११ — विश्वरूपदर्शनयोग — (श्लोक २१ ते ३०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक…

अमी हि त्वां सुरसङ्‍घा विशन्ति केचिद्भीताः प्राञ्जलयो गृणन्ति।

स्वस्तीत्युक्त्वा महर्षिसिद्धसङ्‍घा: स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः ॥२१॥

*

प्रवेशताती तुमच्यामध्ये समूह कितीक देवतांचे

काही होउन भयभीत करिती आर्त स्तवन तुमचे  

सिद्ध-महर्षींच्या कल्याणास्तव मधुर स्तोत्र गाती

प्रसन्न करण्या तुम्हा परमेशा अमाप  करती स्तुती ॥२१॥

*

रुद्रादित्या वसवो ये च साध्याविश्वेऽश्विनौ मरुतश्चोष्मपाश्च ।

गंधर्वयक्षासुरसिद्धसङ्‍घावीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे ॥२२॥

*

आदित्य रुद्र तथा वसू साध्य सवे

अश्विनीकुमार मरुद्गण पितर देवविश्वे

गंधर्व सिद्ध असूर आणि उपदेव यक्ष 

विस्मित घेत दर्शन विस्फारुनीया अक्ष ॥२२॥

*

रूपं महत्ते बहुवक्त्रनेत्रंमहाबाहो बहुबाहूरूपादम्‌ ।

बहूदरं बहुदंष्ट्राकरालंदृष्टवा लोकाः प्रव्यथितास्तथाहम्‌ ॥२३॥

*

नयन आनन भुजा जंघा तथा उदर पाद बहुत

विक्राळ बहुत दंत देखुनी व्याकुळ सकल होत ॥२३॥

*

नभःस्पृशं दीप्तमनेकवर्णंव्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम्‌ ।

दृष्टवा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा धृतिं न विन्दामि शमं च विष्णो ॥२४॥

*

दर्शन होता तुमचे विष्णो विशाल व्योमव्याप्त  

बहुवर्णी बहूत आनन अष्टदिशांना आहे पहात

विशाल तव नयन देदिप्यमान मुखावरी अगणित

शांती ढळली धैय गळाले अंतर्यामी मी भयभीत ॥२४॥

*

दंष्ट्राकरालानि च ते मुखानिदृष्टैव कालानलसन्निभानि ।

दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास ॥२५॥

*

प्रलयकाली अग्नी सम मुखात कराल दंत

हरपले दिशाभान सुखचैन ना मज प्राप्त

विराट कराल तव या दर्शने मी भयभीत

जगन्निवासा देवेशा प्रसन्न व्हा करण्या शांत ॥२५॥

*

अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सहैवावनिपालसंघैः ।

भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथासौ सहास्मदीयैरपि योधमुख्यैः ॥२६॥

*

वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्राकरालानि भयानकानि ।

केचिद्विलग्ना दशनान्तरेषु सन्दृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्‍गै ॥२७॥

*

धृतराष्ट्रपुत्र तथा समस्त राजे तुझ्यात प्रवेशतात

भीष्म द्रोण प्रधान वीर अंगराज कर्ण समवेत 

तव कराल मुखात वेगे वेगे प्रवेर करत दौडत

कित्येक शीरे चूर्ण दिसतात तुझ्या भयाण मुखात ॥२६,२७॥

*

यथा नदीनां बहवोऽम्बुवेगाः समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति ।

तथा तवामी नरलोकवीराविशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति ॥२८॥

*

दुथडी सरिता वेगाने वाहते विलिन व्हावया दर्यात

नरवीर तद्वत  प्रवेशती विलिन व्हावया तव मुखात ॥२८॥

*

यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगाविशन्ति नाशाय समृद्धवेगाः ।

तथैव नाशाय विशन्ति लोकास्तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः ॥२९॥

*

पतंग झेपावे मोहवशे धगधगत्या अग्नीमध्ये

जळुन खाक व्हावया  अनलाच्या ज्योतीमध्ये

समस्त लोक विवेकशून्य स्वनाश करुन घ्यावया

मुखात तुमच्या वेगाने धावतआतुर प्रवेशावया ॥२९॥

*

लेलिह्यसे ग्रसमानः समन्ताल्लोकान्समग्रान्वदनैर्ज्वलद्भिः ।

तेजोभिरापूर्य जगत्समग्रंभासस्तवोग्राः प्रतपन्ति विष्णो ॥३०॥

*

ग्रास करुनिया त्या सकलांचा माधवा चर्वण करिता

उग्र तेज आपुले तापुनी भाजुन काढी समस्त जगता ॥३०॥

 

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares