मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘बाईपण भारी’… आणि वैशाली नाईक… ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘बाईपण भारी’… आणि वैशाली नाईक ☆ सौ. गौरी गाडेकर

तुम्ही केदार शिंदेंचा ‘बाईपण भारी देवा ‘ बघितला असेलच.

ही कथा  आहे मंगळागौरीच्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या सहा बहिणींची.

यांच्या मनावर लहानपणी खेळलेल्या मंगळागौरीच्या खेळांच्या आठवणीची जादू आहे. त्यामुळे आणि भरघोस बक्षिसाच्या आशेने आणि कोणी ‘इगो’ सुखावण्यासाठीही  या स्पर्धेत भाग घेतात.

पण पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. पूर्वीच्या सडपातळ, चपळ, लवचिक शरीराने केव्हाच साथ सोडलीय. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक जण आपापल्या संसारात आपापल्या परीने बाईपणाचं ओझं वाहतेय. तर अशा या बहिणी स्पर्धा जिंकायची तयारी कशी करतात, त्यांचं ते स्वप्न पुरं होतं का, त्या धडपडीत त्यांच्या हाती इतरही काही लागतं का, ते तुम्ही बघितलं असेलच. नसल्यास जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा.

आज हा लेख या सिनेमाची जाहिरात करण्यासाठी लिहिलाय की काय अशी शंका येईल कदाचित.. पण तसं अजिबातच नाही. हा लेख लिहिलाय तो – या चित्रपटाची प्रभावी आणि पठडीबाहेरची कथा, पटकथा, आणि त्यातले खुमासदार संवादही जिने लिहिले आहेत –  त्या वैशाली नाईक या जेमतेम ३३-३४ वर्षाच्या तरुणीच्या कौतुकास्पद अशा अफाट कल्पनाशक्तीची आणि लेखन-सामर्थ्याची कल्पना माझ्यासारखीच इतरांनाही यावी म्हणून. . हा चित्रपट म्हणजे वैशालीचं  मराठी सिनेसृष्टीतलं पहिलं दमदार आणि यशस्वी पाऊल.

यापूर्वी तिने ‘दिया और बाती’,  ‘ये उन दिनों की बात है’, ‘बॅरिस्टर बाबू ‘, ‘तू मेरा हिरो’ वगैरे अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांचं लेखन केलं आहे. सद्या ती ‘ये रिश्ता क्या क्या लाता है’ या हिंदी मालिकेचं लेखन करत आहे.

वैशालीने यापूर्वी ‘सेव्हन स्टार डायनॉसर एन्टरटेनमेंट’ ही शॉर्ट फिल्म बनवली आहे.

‘सेव्हन स्टार डायनॉसर….’ ही फिल्म ‘धरमशाला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’, ‘पाम (palm) स्प्रिंग्ज इंटरनॅशनल शॉर्ट फेस्ट 2022’, ‘ब्रुकलीन फिल्म फेस्टिवल 2022’, ‘मॅंचेस्टर फिल्म फेस्टिवल 2022’, ‘न्यू यॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल 2022’, ‘ऍथेन्स इंटरनॅशनल फिल्म अँड व्हिडीओ फेस्टिवल 2022’, ‘लंडन इंडियन फिल्म फेस्टिवल’ वगैरेमध्ये प्रदर्शित केली गेली आणि वाखाणलीही गेली, हे आवर्जून सांगायला हवे. 

‘IFFLA’ ( इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ लॉस एंजलीस)मध्ये या फिल्मने ‘Audience Choice Award’ पटकावलं आहे. 

याशिवाय वैशालीने काही हिंदी बालकथाही लिहिल्या आहेत. त्या म्हणायला बालकथा असल्या तरी त्या मोठ्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणाऱ्या आहेत हे विशेष. 

सी. एस.( कंपनी सेक्रेटरी ) आणि एल. एल. बी. अशा पूर्णपणे व्यावसायिक आणि रुक्ष म्हणता येईल अशा विद्याशाखांच्या पदव्या प्राप्त केलेली वैशाली, साहित्याच्या या सुंदर आणि समृद्ध विश्वात अचानक पाऊल टाकते काय आणि बघता बघता इतक्या कमी वयातच इथे पाय घट्ट रोवून दिमाखाने उभी रहाते काय …. .. हा तिचा वेगवान आणि झपाट्याने यशाच्या दिशेने होत असलेला प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. 

वैशाली नाईक या प्रतिभाशाली तरुण लेखिकेची साहित्य- क्षेत्रातली मुशाफिरीच इतकी दमदारपणे सुरु झालेली आहे की, “ आता ही पोरगी काही कधी मागे वळून बघणार नाही “ असं अगदी खात्रीपूर्वक म्हणता येईल. 

वैशालीची ही साहित्यिक घोडदौड अशीच चौफेर चालू राहो, आणि तिला नेहेमीच असे भरघोस यश मिळो, याच तिला मनःपूर्वक शुभेच्छा !

 सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आनंदकंद ऐसा… भाग-2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ आनंदकंद ऐसा… भाग-2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी 

१८५७ पूर्वीचा भारत

(मागील भागात आपण पाहिले की फॅनी पार्कस् हिला भारतासंबंधी कुतूहल होते. भारतात अनुभवलेल्या विविध विषयांचे सचित्र वर्णन तिने केले आहे. आता त्या पुढील भाग…)

हिंदुस्थानातल्या अनेक प्रकारच्या झाडांची माहिती, त्यांचे उपयोग, धनुष्य बनविण्याची पद्धत, सतार कशी बनविली जाते, स्थानिक भाषेतील म्हणी व वाक्प्रचार असे अनेक विषय फॅनीच्या लिखाणात येतात. वन्य प्राणी, कीटक, जीवजंतू यांचीही ती अभ्यासक होती.

फॅनीने लिहिले आहे की, ‘कंपनी सरकार नेटिवांच्या अंधश्रद्धेचा फायदा उकळते. प्रयागला संगमावर स्नान करण्यासाठी प्रत्येकी एक रुपया कर द्यावा लागतो. एक रुपयात एक माणूस महिनाभर सहज जेवू शकतो हे लक्षात घेतले तर हा कर भयंकर आहे.’

सुरुवातीला आलेल्या काही इंग्रजांनी मुगल राजघराण्यात विवाह केले होते आणि त्यांच्यासारखे ऐश्वर्य उपभोगत होते. अशा अँग्लो- इंडियन्सना व्हाईट मुघल्स म्हटले जाई.

बर्मा वॉरवर गेलेल्या काही परिचितांकडून फॅनीला हिंदू ,बौद्ध देवदेवतांच्या मूर्ती भेट मिळाल्या होत्या. त्यातील एक सोन्याची, काही चांदीच्या आणि बाकी ब्रांझ आणि संगमरवराच्या होत्या. अनेकांनी अशा मूर्ती फोडून त्यांच्या डोळ्यांच्या जागी बसविलेले हिरे काढून घेतले. काही मूर्तींच्या तर डोक्यात हिरे साठवलेले होते. फॅनीने आठवण म्हणून मिळालेल्या मूर्ती तशाच ठेवल्या.

प्रचंड टोळधाडीमुळे फॅनी उदास झाली. त्यावेळेच्या भीषण दुष्काळाचे वर्णन वाचताना अंगावर काटा येतो. आई- वडील धान्यासाठी, पैशासाठी आपली मुलेही विकत होती.

महादजी शिंदे यांचा दत्तक मुलगा दौलतराव यांची विधवा पत्नी बायजाबाई शिंदे यांची व फॅनीची चांगली मैत्री झाली होती.

हिंदू धर्माप्रमाणेच फॅनीने मोहरमचा सण, त्या मागची कथा, प्रेषितांच्या कुटुंबाची माहिती,शिया आणि सुन्नी यामधील फरक या सगळ्याविषयी लिहिले आहे. वाघाच्या शिकारीच्या अनेक कहाण्या तिने लिहिल्या आहेत. उच्च स्तरातील इंग्रजांची आयुष्यं सुखाची होती. त्यांच्याकडे सगळ्या कामांसाठी नोकर- चाकरांची फौज होती. संस्थानिकांकडून त्यांना किमती हिरे माणके  अशा भेटींनी भरलेली ताटे मिळत असत. इंग्रज परके आहेत, शत्रू आहेत ही जाणीव भारतीय नेणीवेत उरली नव्हती.

तीव्र उन्हाळ्यामुळे आजारी पडून फॅनी मसूरीजवळच्या थंड हवेच्या ठिकाणी जवळपास सहा महिने राहिली. तिथेही तिने पहाडात फिरुन, माहिती गोळा करून तिथल्या आजूबाजूच्या प्रदेशाचा आणि हवामानाचा दस्तऐवज करून ठेवला आहे. पहाडातला पाऊस, दरडी कोसळणे भूकंपाचे हलके धक्के, तिथली माणसे, झाडे, इतर वनस्पती, पक्षी, फुलपाखरे या सगळ्यांची निरीक्षणे नोंदविली आहेत. पहाडी बायकांचे जिणे फार कष्टप्रद असते असेही लिहिले आहे.

फॅनी स्वतंत्र बुद्धिमत्तेची आणि भारताविषयी प्रेम असणारी होती. हा भारत तिचा तिने शोधलेला होता. तीव्र निरीक्षण शक्ती आणि रसाळ लेखणी यामुळे तिचे लेखन आजही टवटवीत वाटते. घोड्यावर बसून फिरणारी, सतार वाजवणारी, उर्दू बोलणारी, सिगरेट ओढणारी, देवळांमध्ये, घाटांवर, बाजारात फिरणारी, गलबत घेऊन एकटीच प्रवासाला जाणारी ही मेम हे भारतीयांसाठीही एक आश्चर्यच होते.

अभ्यासू लेखिका सुनंदा भोसेकर यांचा ऋतुरंगमधील फॅनीने पाहिलेल्या भारतावरील लेख मी वाचला होता. आवडलेल्या लेखांच्या झेरॉक्स प्रति   जमविण्याची मला आवड होती. करोनाच्या कंटाळवाण्या काळात कपाट आवरताना निराश मनःस्थितीत यातील बहुतेक सर्व लेखांना मुक्ती मिळाली .सुनंदाताईंना या लेखासाठी जेव्हा मी मेल केली तेव्हा अगदी तत्परतेने त्यांचे उत्तर आले. हा लेख माझ्या अजून लक्षात आहे याचेच कौतुक करून त्यांनी मला ऋतुरंग आणि शब्द रुची मधील त्यांच्या लेखांची पीडीएफ लगेच पाठविली. त्यांनी असेही कळविले की, फॅनीने पाहिलेल्या भारताचे लेख समाविष्ट असलेले त्यांचे पुस्तक प्रसिद्धीच्या मार्गावर आहे. भारतात येऊन गेलेल्या परदेशी प्रवाशांविषयी त्यांच्या स्वतःच्या प्रवास वर्णनावर आधारित लेखमाला या पुस्तकात असेल चंद्रगुप्ताच्या दरबारात आलेल्या  मेगास्थेनिसपासून जहांगीराच्या दरबारात आलेल्या थॉमस रो पर्यंतचे लेख या पुस्तकात असणार आहेत. आपण या पुस्तकाची वाट पाहूया.

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आनंदकंद ऐसा… भाग-1 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ आनंदकंद ऐसा… भाग-1 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी 

१८५७ पूर्वीचा भारत

इ.स.१८२२. फॅनी  पार्कस् आणि चार्ल्स क्रॉफर्ड पार्कस् हे दांपत्य पाच महिने बोटीने प्रवास करून इंग्लंडहून कोलकत्याला उतरले. फॅनीचा नवरा चार्लस् ईस्ट इंडिया कंपनीत कारकून होता.फॅनी चांगली चित्रकार होती. प्रवास आणि घोडदौड हे तिचे छंद होते . इथले लोकजीवन, धर्म, राजकारण, इतिहास, भूगोल हे सर्व  जाणून घेण्यात तिला रस होता . ती नेहमी स्वतःजवळ डायरी आणि स्केच बुक बाळगत असे. भारतात २४ वर्षे राहून ती लंडनला परत गेली. त्यानंतर  तिच्या डायऱ्या व अनुभव यावर आधारित तिने  पुस्तक लिहिले आहे. ते दोन खंडांमध्ये आहे.या पुस्तकातील बहुतेक सगळी रेखाचित्रे तिची स्वतःची आहेत.  पुस्तकावरील फॅनी पार्कस्  हे नाव आणि  सगळ्या चित्रांखाली तिची सही उर्दूमध्ये आहे. पुस्तकाच्या पहिल्या पानावर ‘श्री गणेश’ असं देवनागरीत लिहून त्याच्याखाली एखाद्या हिंदू घरातला सर्व देवदेवता असलेला देव्हारा असावा तसे चित्र आहे. शंख, घंटा, पळी पंचपात्र, ताम्हन यांचीही चित्रे आहेत. ती गणपतीला सलाम करते.  ‘ही गणपतीसारखी  लिहिते’ असे म्हटले जाऊ दे!’ असा आशीर्वाद ती गणपतीकडे मागते.

फॅनीने लिहिले आहे की, कोलकत्यामध्ये कॉलरा, देवी,एंन्फ्लूएंझा  असे साथीचे रोग होते.   घरात, बागेत सर्रास साप- विंचू सापडत होते.

नंतर चार्लसची बदली अलाहाबादला झाली. बोटीने ८०० मैल आणि घोड्यावरून ५०० मैल असा प्रदीर्घ प्रवास त्यांनी वाटेतल्या डाकबंगल्यांमध्ये मुक्काम करत केला . वाराणसीमध्ये ती हिंदू देवळांमध्ये गेली. तिने लिहिले आहे की हिंदूंचे सगळ्यात पवित्र शहर अंधश्रद्धेने भरलेले आहे. भोळसटपणा हा एक वाढीव अवयव हिंदूंमध्ये आहे.

अलाहाबादला पोहोचल्यावर त्यांनी यमुना नदीच्या किनाऱ्यावर  घर घेतले. फॅनी लिहिते की अंधाऱ्या,  धुक्याने काळवंडलेल्या लंडनमध्ये राहणारे लोक या उत्साही, आनंदी हवामानाची कल्पनाही करू शकणार नाहीत.

लखनौचा एक  इंग्रज सरदार अवधच्या नबाबाला भेटणार होता. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी फॅनीला तिच्या लखनौच्या मैत्रिणीने आमंत्रण दिले.  नबाबी थाटाचे जेवणाचे समारंभ,नाच- गाणे, जनावरांच्या झुंजी झाल्या. इंग्रज पाहुणी म्हणून फॅनीला अनेक काश्मिरी शाली, भारतीय मलमलीचा आणि किनखाबाचा एकेक तागा , मोत्याच्या माळा, किमती खड्यांच्या बांगड्या, इतर दागिने भेट मिळाले.

अलाहाबादला  राहत असताना तिने सती जाण्याचा प्रसंग पाहिला. त्याचे हृदयद्रावक वर्णन आपण वाचू शकत नाही.

 १८३० मध्ये तिच्या नवऱ्याची बदली कानपूरला हंगामी कलेक्टर म्हणून झाली.दीडशे मैलांचा हा प्रवास पालखीतून सशस्त्र पोलीस बंदोबस्तात झाला.  या काळात उत्तर हिंदुस्थानात ठगांच्या टोळ्यांनी  धुमाकूळ घातला होता.हे ठग  प्रवाशांना लुटून, मारून त्यांची प्रेते विहिरीत फेकून देत. फॅनीने ठगांच्या कार्यपद्धतीची माहिती मिळवून त्याचे सचित्र वर्णन केले आहे.

कानपूरमध्ये चामड्याच्या वस्तूंचा धंदा जोरात होता. चामड्यासाठी विष घालून जनावरे मारण्याचा प्रकारही सर्रास होत असे.

२६ जुलै १८३१ ला फॅनीच्या डायरीत नोंद आहे की गव्हर्नर जनरलने आग्र्याची प्रसिद्ध मोती मस्जिद रुपये १,२५,००० या रकमेला विकली. ती पाडून तिचे संगमरवर विकण्यात येणार आहे. ताजमहालही विकण्यात येणार आहे असे जाहीर झाले आहे.  फॅनीने याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ती लिहिते की गव्हर्नरजनरलला ताजमहाल विकण्याचा काय अधिकार आहे? पैशासाठी असे करणे अशोभनीय आहे. पुढे पार्लमेंटमध्ये गदारोळ झाल्यामुळे हा प्रस्ताव बारगळला आणि ताजमहाल वाचला.

१८३४   मध्ये फॅनीने एक लहान गलबत खरेदी केले .  खलाशांना घेऊन ती एकटीच प्रवासाला निघाली.तिने ताजमहालचे अगदी बारकाईने वर्णन केले  आहे. आग्र्याच्या किल्ल्यातील संगमरवरी नक्षीकाम केलेले आणि रत्नमाणकं जडविलेले बाथटब काढून गव्हर्नरजनरलने ते इंग्लंडच्या राजाला पाठविल्याचे तिने लिहिले आहे. तसेच तिथल्या गुप्तपणे फाशी देण्याच्या अंधाऱकोठडीबद्दलही लिहिले आहे.

१८५७ पूर्वीचा भारत— भाग एक समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अस्तित्व… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

? विविधा ?

☆ अस्तित्व… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

आजचे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल गाव. महाभारतातील कौरव पांडवांच्या काळातील एकचक्र नगरी. एके काळची जुनी बाजारपेठ. ऐतिहासिक गाव. या इतिहासाच्या खुणा आज भग्नावस्थेत का होईना पण एके काळच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. वेगवेगळे जुने ऐतिहासिक दरवाजे, वाडे, बुरुज, बारव आजही गतवैभवाच्या खुणा अंगाखांद्यावर मिरवत आहेत. गावात प्राचीन मंदिरे आहेत. राम मंदिर, केशवराज मंदिर, गणेश मंदिर, शिव मंदिर अशी अनेक मंदिरे आहेत. जवळच पद्मालय म्हणून एक निसर्गरम्य ठिकाण आहे. या ठिकाणी श्री गणेशाचे जागृत असे देवस्थान आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथे एकाच ठिकाणी उजव्या सोंडेचा आणि डाव्या सोंडेचा अशा दोन गणेश मूर्ती आहेत. मंदिराबाहेर ४४० किलो वजन असलेली एक पंचधातूची प्रचंड मोठी घंटा आहे. तिचा आवाज अनेक किमी पर्यंत दूर ऐकू जातो असे म्हणतात. मंदिरासमोर असलेल्या तळ्यात सुंदर कमळे उमललेली असतात. म्हणूनच पद्मालय असे सार्थ नाव या पवित्र ठिकाणाला आहे. श्री गणरायाला रोज कमलपुष्पे अर्पण केली जातात. येथे अंगारकी, संकष्टी चतुर्थी आणि सुट्यांच्या दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी असते. येथून जवळच भीमाने बकासुराचा वध ज्या ठिकाणी केला ती जागा आहे. 

एकचक्रनगरी या नावाव्यतिरिक्त एरंडोल शहराची अरुणावती आणि ऐरणवेल अशीही नावे असल्याचे सांगितले जाते. कदाचित ऐरणवेल या नावाचा अपभ्रंश होऊन एरंडोल हे नाव पडले असावे. अशा या गावात पांडव अज्ञातवासात असताना राहिले होते. ते या ठिकाणी ज्या वाड्यात राहिले होते, त्या वाड्याला पांडववाडा असे नाव पडले आहे. आजही हा वाडा या पौराणिक घटनेची साक्ष देत उभा आहे. या वाड्याच्या प्रवेशद्वारावर कमळफुलांची नक्षी आहे. आत प्रवेश केल्यावर भरपूर मोकळी आणि प्रशस्त जागा, रुंद आणि अनेक खिडक्या असलेल्या भिंती आहेत. त्यांच्यावर नक्षीकाम आहे. आज मात्र या पांडववाड्याकडे बघवत नाही. तिथे जामा मशीद उभी आहे. वास्तू कडीकुलुपात बंदिस्त आहे. या पांडव वाड्याजवळच एक धर्मशाळा आहे. एक मोठे वडाचे झाड आहे. तिथे पारावर एका बाजूला गणपती आणि देवीचं मंदिर आहे. 

याच पांडव वाड्याच्या उजव्या बाजूला एक ऐतिहासिक केशवराजाचं मंदिर उभं आहे. मंदिरात काळ्या पाषाणापासून तयार झालेली केशवाची देखणी आणि रेखीव मूर्ती आहे. या मंदिराची देखभाल आणि मालकी मैराळ परिवाराकडे गेल्या सात ते आठ पिढ्यांपासून आहे. काही भाविकांचे हे कुलदैवतही आहे. याच मंदिरात ज्यांचं वास्तव्य होतं असे प्रकाशराव मैराळ हे माझे नात्याने साडू आणि माझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ. पण साडू किंवा मेहुणे यापेक्षाही आमच्या नात्याला मैत्रीच्या नात्याची किनारच जास्त ! 

लग्नानंतर आमचं खूपदा एरंडोलला जाणं येणं व्हायचं. मंदिरात पाऊल ठेवताच प्रकाशराव हसतमुखाने आमचं तत्परतेनं स्वागत करायचे. साधारण पाच फूट उंची पण सुबक ठेंगणी अशी त्यांची मूर्ती. पिळदार आणि गोटीबंद शरीर. चेहऱ्यावर सदैव हास्य विराजमान. प्रकाशराव म्हणजे उत्साहमूर्ती ! त्यांचा दिवस सकाळी पाच वाजताच सुरु व्हायचा. मंदिराच्या बाजूला असलेल्या विहिरीचं पाणी सकाळी रहाटाने काढून सगळ्यांसाठी भरून ठेवणार. त्याच पाण्याने स्तोत्र म्हणत त्यांचं स्नान व्हायचं. मग केशवराजाची यथासांग पूजा असायची. मंत्र, आरती सगळं काही शुद्ध आणि खणखणीत आवाजात. प्रकाशराव जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक होते. त्यांच्या विविध गावी बदल्या व्हायच्या. पण कुरकुर, तक्रारीचा सूर कधीच ऐकू यायचा नाही. देवाची पूजा झाली की ही वामन मूर्ती सायकलवर बसून आपल्या शाळेत वेळेवर हजर असायची. गावकरी, शिक्षक, अधिकारी आणि विद्यार्थी साऱ्यांनाच हवेहवेसे वाटणारे आणि आपल्या कर्तव्यात कधीही कसूर न करणारे हे व्यक्तिमत्व होते. 

देव काही काही माणसांना प्रचंड ऊर्जा देतो. तसंच प्रकाशरावांच्या या उत्साहाचं मला नेहमी कौतुक वाटायचं. देवपूजा, घरातील कामं हे सगळं आटोपून वेळ मिळाला की स्वारी सायकलला टांग मारून शेतावर जायची. त्यांची पत्नी म्हणजेच माझ्या सौभाग्यवतीची तीन नंबरची बहीण सुद्धा प्रचंड कष्टाळू . खरं तर ती स्टेनो झालेली होती. शहरात उत्तम पगाराची नोकरी तिला त्या काळात कुठेही सहज मिळाली असती. पण तिने प्रकाशरावांचा संसार प्रकाशमान केला. स्वतःला त्यात विलीन करून टाकले. आपल्या दोन जुळ्या मुली आणि एक मुलगा यांना शिक्षणाबरोबरच उत्तम संस्कार प्रकाशराव आणि बेबीताईंनी दिले. 

दोघांनीही केशवराजाच्या सेवेत कधी कसूर केली नाही. सगळे सण, उत्सव ते मोठ्या उत्साहाने आणि प्रेमाने करीत राहिले. चातुर्मासात प्रकाशराव मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी भागवताचे वाचन करीत. एरंडोल गावातील गावकऱ्यांसाठी प्रकाशराव आणि बेबीताई दोघेही आदराचे स्थान. केशवराजा या दोघांची कसून परीक्षा घेत होता. पण हे दोघेही त्यात कुठेही कमी पडले नाहीत. त्याचे फळ केशवराजाने पदरात घातले. दोन्ही जुळ्या मुली प्रेरणा आणि प्रतिमा यांना उत्तम स्थळे मिळून त्यांचा विवाह झाला. मुलगा श्रीपाद एम फार्म होऊन मुंबईला कंपनीत रुजू झाला. यथावकाश त्याचेही लग्न झाले. केशवराजाच्या कृपेने उच्चशिक्षित, सद्गुणी अशी प्राजक्ता सून म्हणून घरात आली. प्राजक्ता आणि श्रीपादच्या संसारवेलीवर दोन कळ्या उमलल्या. एक मुलगा आणि एक मुलगी. 

असं सगळं सुखात चाललं होतं. प्रकाशराव आपला सेवाकाल पूर्ण करून निवृत्त झाले होते. आता खरे तर त्यांचे सुखाचे आणि आरामाचे दिवस होते. पण माणसाच्या नशिबी असलेले भोग काही चुकत नाहीत. मुखात अखंड गोपाळकृष्णाचे नाव असलेल्या या उत्साही, आनंदी आणि तत्पर माणसाला संधी मिळताच आजारांनी ग्रासले. त्यांना रक्तदाब आणि मधुमेहाचा विकार लागला. पुढे पुढे तर मेंदूचे शरीरावर असणारे नियंत्रण कमी कमी होत गेले. जवळपास अकरा ते बारा वर्षे प्रकाशरावांना जळगाव येथील मेंदूरोग तज्ज्ञांचे उपचार सुरु होते. कधी थोडीफार सुधारणा दिसायची. पण पुन्हा सगळ्यांना त्यांची काळजी लागून राहायची. या सगळ्या कालावधीत बेबीताई पदर खोचून धीराने उभ्या राहिल्या. जवळ कोणी नसताना गाडी करून त्यांना जळगावला उपचारासाठी त्या घेऊन जायच्या. शनिवार रविवार श्रीपाद मुंबईहून येऊन आईला मदत करायचा. प्राजक्ताही आपल्या दोन लहानग्यांना सांभाळून सासू सासऱ्यांच्या सेवेत तत्पर असायची. 

अशा परिस्थितीही बेबीताईंनी केशवराजाकडे कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष होणार नाही याची भक्तिभावाने आणि प्रेमाने काळजी घेतली. चातुर्मासात प्रकाशरावांचा भागवत सांगण्याचा वारसा त्यांनी घेतला. आम्ही अधूनमधून एरंडोलला जायचो. आम्ही गेलो की यापूर्वी सदैव उत्साही असणाऱ्या असणाऱ्या  प्रकाशरावांना असं परावलंबी होऊन अंथरुणावर पडलेलं पाहताना गलबलून यायचं. शेवटी शेवटी तर फिट्स यायला सुरुवात झाली. बेबीताई आणि मुलांनी उपचारात कसूर ठेवली नाही. पण फार काही सुधारणा होत नव्हती. प्रकाशरावांच्या मुखातून गोपाळकृष्णाचे नाव मात्र ऐकू येई. आपल्या केशवराजावर त्यांचं अतोनात प्रेम आणि श्रद्धा. 

आधी गावभर, मंदिरभर, घरभर असणारे प्रकाशरावांचे अस्तित्व आता अंथरुणावर होते. गेल्या महिन्यात परिस्थिती आणखी बिघडली. प्रकाशरावांना जळगावला अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले. पण सुधारणा होण्याचे चिन्ह दिसत नव्हते. त्यांना शेवटी कृत्रिम श्वासोश्वास देण्यात आला. डॉक्टरांनी सगळे प्रयत्न करून झाल्यानंतर त्यांना घरी नेण्यास सांगितले. घरी आणल्यानंतर तीन साडेतीन तासात केशवराजाच्या साक्षीने त्यांनी या जगाचा निरोप घेतला. एक प्रकाश दुसऱ्या प्रकाशात विलीन झाला होता. एक उत्साहमूर्ती शांत झाली होती. निर्जीव देहाच्या रूपात आता त्यांचं अस्तित्व उरलं होतं. काही तासांनी तेही अस्तित्व लोप पावलं. तिसऱ्या दिवशी केवळ अस्थींच्या स्वरूपात हे अस्तित्व उरलं. काही दिवसांपूर्वी आपल्याशी हसून खेळून बोलणाऱ्या व्यक्तीचं अस्तित्व आपल्यासमोरच कसं हळूहळू नष्ट होत जातं याचा विषण्ण अनुभव मी घेत होतो. यथावकाश त्या अस्थीही नर्मदेत विसर्जित करण्यात आल्या. रक्षा नदीत सोडून देण्यात आली. आता त्यांच्या अस्तित्वाच्या त्याही खुणा नष्ट झाल्या होत्या. 

प्रकाशराव गेल्यावर गावातील लोक हळहळले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी स्त्री पुरुषांनी गर्दी केली. श्रीपादच्या मित्रांनी अंत्यविधीची सगळी व्यवस्था केली. नगराध्यक्षांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक त्यांना निरोप देण्यासाठी उपस्थित होते. त्यांच्या घरी तीन दिवस जेवण आणि चहाची व्यवस्था गावातील लोकांनीच केली. ग्रामीण भागातील लोकांचे प्रेम आणि माणुसकी अजून टिकून आहे याचे दर्शन या निमित्ताने घडले.

आता मंदिरात होती त्यांची प्रतिमा हार घातलेली. आता त्यांचं अस्तित्व फोटोतच असं म्हणायचं का ? त्यांनी मुलांना दिलेले संस्कार, आपल्या ज्ञानदानाने घडवलेले विद्यार्थी, गावातील लोकांना दिलेलं प्रेम या सगळ्यांच्या रूपात त्यांचं अस्तित्व आहेच ! तुकाराम महाराज म्हणतात 

तुका म्हणे एका मरणेची सरे । उत्तमची उरे कीर्ती मागे ।।

हा देह नाशिवंत आहे. हाताने नित्य सत्कर्म करावे आणि मुखाने परमेश्वराचे नाम घ्यावे. त्यातच जीवनाचे सार्थक आहे. मरावे परी कीर्तिरूपे उरावे असेच तुकोबाराय सांगतात. एरंडोल नगरीत महाभारतकालीन पांडववाडा, विविध मंदिरे, दरवाजे आदींचे अस्तित्व उरले आहे. त्या काळातील कीर्ती त्या वास्तू गात राहतील. प्रकाशरावही स्मृती रूपाने आपले अस्तित्व मागे ठेऊन गेले आहेत. 

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मंडल : १ : ३० : ऋचा ६ ते १०— मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मंडल : १ : ३० : ऋचा ६ ते १० — मराठी भावानुवाद. ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त ३० (इंद्र, अश्विनीकुमार, उषासूक्त)

देवता – १-१६ इंद्र; १७-१९ अश्विनीकुमार; २०-२२ उषा

ऋषी – शुनःशेप आजीगर्ति

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील तिसाव्या  सूक्तात एकंदर बावीस ऋचा आहेत. या सूक्तात शुनःशेप आजीगर्ति या ऋषींनी इंद्र, अश्विनीकुमार आणि उषा या देवतांना आवाहन केलेली असल्याने हे इंद्र-अश्विनीकुमार-उषासूक्त सूक्त म्हणून ज्ञात आहे. यातील पहिल्या  सोळा ऋचा इंद्राला, सतरा ते एकोणीस  या ऋचा अश्विनिकुमारांना आणि वीस ते बावीस या  ऋचा उषा देवतेला  आवाहन करतात.

या सदरामध्ये आपण विविध देवतांना केलेल्या आवाहनानुसार  गीत ऋग्वेद पाहूयात. आज मी आपल्यासाठी इंद्र देवतेला उद्देशून रचलेल्या सहा ते दहा या ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.

मराठी भावानुवाद ::

ऊ॒र्ध्वस्ति॑ष्ठा न ऊ॒तये॑ऽ॒स्मिन्वाजे॑ शतक्रतो । सम॒न्येषु॑ ब्रवावहै ॥ ६ ॥

 कार्यांमध्ये पराक्रमांच्या करि संरक्षण अमुचे

सामर्थ्यशाली देवेंद्रा उभे उठुन ऱ्हायचे

हे शचीपतये तुमच्या अमुच्या मध्ये कोणी नसावे

संभाषण अमुचे आता तुमच्यासवेचि हो व्हावे ||६||

 योगे॑योगे त॒वस्त॑रं॒ वाजे॑वाजे हवामहे । सखा॑य॒ इंद्र॑मू॒तये॑ ॥ ७ ॥

 वैभवाची आंस जागता अमुच्या आर्त मनात

शौर्य अपुले गाजविण्याला तुंबळ रणांगणात

भक्ती अमुची देवेन्द्रावर चंडप्रतापी तो

सहाय्य करण्या आम्हाला त्यालाची पाचारितो ||७||

आ घा॑ गम॒द्यदि॒ श्रव॑त्सह॒स्रिणी॑भिरू॒तिभिः॑ । वाजे॑भि॒रुप॑ नो॒ हव॑म् ॥ ८ ॥

 कानावरती पडता अमुची आर्त स्तोत्र प्रार्थना

मार्ग सहस्र दाविल अपुले अमुच्या संरक्षणा

प्रदर्शीत करुनी अपुल्या बाहूंचे सामर्थ्य 

खचीत येईल साद ऐकुनी देवेंद्राचा रथ  ||८||

 अनु॑ प्र॒त्नस्यौक॑सो हु॒वे तु॑विप्र॒तिं नर॑म् । यं ते॒ पूर्वं॑ पि॒ता हु॒वे ॥ ९ ॥

 अगणित असुनी रिपू भोवती अजिंक्य हा शूर
तव पितयाने केला इंद्राचा धावा घोर

सोडून अपुल्या दिव्य स्थाना आम्हासाठी यावे

देवेंद्रा रे सदैव संरक्षण आमुचे करावे ||९||

 तं त्वा॑ व॒यं वि॑श्ववा॒रा शा॑स्महे पुरुहूत । सखे॑ वसो जरि॒तृभ्यः॑ ॥ १० ॥

 प्रेम अर्पिण्या दुजा न कोणी विशाल या विश्वात

अखंड आळविती विद्वान तव स्तोत्राला गात

आम्हीही सारे करितो देवेंद्रा तुझी स्तुती

मूर्तिमंत तू भाग्य तयांचे स्तुती तुझी जे गाती ||१०||

(या ऋचांचा व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)

https://youtu.be/sxUQqA61WDU

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 30 Rucha 6 to 10

Rugved Mandal 1 Sukta 30 Rucha 6 to 10

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “जाणून घेऊ अवयवदान…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ “जाणून घेऊ अवयवदान…” ☆ श्री सुनील देशपांडे

(या वर्षीपासून तीन ऑगस्ट हा राष्ट्रीय अवयवदान दिन म्हणून पाळावा असे केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याने आवाहन केले आहे. त्यासाठी नेत्रदान, त्वचा दान, देहदान व अवयवदान याविषयी शक्य तितक्या सोप्या भाषेत या विषयाची माहिती सर्वसामान्यांना व्हावी यासाठीचा हा प्रयत्न आहे.)

प्रथम हे जाणून घेतले पाहिजे की अवयवदान आणि देहदान असे या विषयाचे दोन भाग आहेत. अवयवदान आणि देहदान हे विषय एकमेकांपासून वेगळे आहेत. जेव्हा आपण अवयवदान करतो तेव्हा देहदान होऊ शकत नाही आणि जेव्हा देहदान करतो तेव्हा शरीराच्या अंतर्गत अवयवांचे अवयवदान होऊ शकत नाही. मुळातच देहदान आणि अवयवदान या दोन वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये करण्याच्या गोष्टी आहेत. अवयवदान हे एखादी व्यक्ती जिवंतपणी काही मर्यादित स्वरूपात व मेंदू मृत झाल्यानंतर विस्तृत स्वरूपात करू शकते.  देहदान हे नैसर्गिक मृत्यूनंतर म्हणजेच हृदयक्रिया बंद पडून झालेल्या मृत्यू नंतर करता येते.  अशावेळी देहदान करण्यासाठी देह वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यूनंतर सहा तासांच्या आत पोहोचवावा लागतो. तत्पूर्वी फक्त नेत्रदान आणि त्वचादान होऊ शकते.  अवयवदानाच्या बाबतीत मात्र अवयवदान हे जिवंतपणी आणि मेंदूमृत अशा दोन्ही परिस्थितीत होऊ शकते. याबाबत आपण विस्तृत पणाने जाणून घेऊया. 

जिवंतपणी कोणतीही व्यक्ती आपल्या जवळच्या नातेवाईकांना काही अवयवांचे दान करू शकते ते अवयव म्हणजे

१) दोन पैकी एक किडनी म्हणजेच मूत्रपिंड.  

२) लिव्हरचा म्हणजेच  यकृताचा काही भाग.  

३) फुफ्फुसाचा काही भाग, 

४) स्वादुपिंडाचा काही भाग,

५) आतड्याचा काही भाग.

६) गर्भाशय

कोणत्याही व्यक्तीचे आयुष्य एका किडनी वर म्हणजेच मूत्रपिंडावर व्यवस्थित व्यतीत होऊ शकते. त्यामुळे एक किडनी दान केल्याने त्याला कोणताही शारीरिक धोका संभवत नाही.  त्याच प्रमाणे इतर ज्या अवयवांचे काही भाग आपण दुसऱ्या शरीरात प्रत्यारोपित करतो ते अवयव दोन्ही शरीरात काही कालावधीनंतर पूर्ण आकार धारण करून संपूर्ण पणे कार्यरत होतात.  तशी शक्यता असेल तरच डॉक्टर अशा अवयवांचा काही भाग काढून घेण्यास मान्यता देतात. त्यामुळे एखाद्याच्या शरीरातून असे काही भाग काढून घेतल्यास त्याला पुढील आयुष्यात कोणताही शारीरिक धोका संभवत नाही. 

एखाद्या स्त्रीचे गर्भाशय चांगल्या रीतीने कार्यरत असून त्या स्त्रीला पुढे मूल नको असल्यास त्या स्त्रीच्या शरीरातून गर्भाशय काढून ज्या स्त्रीच्या शरीरात गर्भाशय नाही किंवा असलेले गर्भाशय नीट कार्यरत होऊ शकत नाही अशा स्त्रीच्या शरीरात ते प्रत्यारोपित करता येते व त्यामुळे त्या स्त्रीला मूल होऊ शकते.

जिवंतपणी वरील प्रमाणे सर्व अवयव दान करून गरजू रुग्णाच्या आयुष्यात आनंद फुलवता येतो आणि दात्याला कोणताही शारीरिक धोका नसतो हे जाणून घेतले पाहिजे.

मृत्यूनंतर म्हणजेच ब्रेनडेड किंवा मेंदू मृत्यू नंतर. ( याला मस्तिष्क स्तंभ मृत्यू असेही म्हणतात)  हा मृत्यू कसा होतो आणि कोणत्या परिस्थितीत होतो हे जाणून घेणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मेंदू कार्य करणे बंद होते किंवा अपघातामुळे मेंदूला मार लागल्यावर मेंदूचे कार्य थांबते.  किंवा मेंदूच्या खालच्या बाजूला मानेच्या पाठीमागे मस्तिष्क स्तंभ म्हणजेच ब्रेन स्टेम हा जो भाग असतो याला मार लागल्याने त्याचे कार्य बंद होते अशावेळी होणारा मृत्यू यास मेंदू मृत्यू किंवा मस्तिष्क स्तंभ मृत्यू असे म्हणतात.  हा मृत्यू झाला हे कोणत्या परिस्थितीत समजते ते जाणणे आवश्यक आहे.  मेंदूमध्ये रक्तस्त्राव होऊ लागल्यानंतर प्रचंड डोके दुखू लागते. कधी कधी या डोकेदुखीने पेशंट बेशुद्धावस्थेत जातो, किंवा अपघातामुळे एखाद्याचे मेंदूला किंवा मेंदू स्तंभाला मार लागतो.  या सर्व परिस्थितीत त्या रुग्णास त्वरित रुग्णालयात दाखल केले गेल्यास रुग्णालयामध्ये त्याला अतिदक्षता विभागात नेतात आणि व्हेंटिलेटरच्या सहाय्याने त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यात येतो. अशा वेळेला जर डॉक्टरांच्या लक्षात आले आणि जर काही विशिष्ट परीक्षणानंतर याची खात्री झाली की त्या व्यक्तीचा मेंदू किंवा मस्तिष्क स्तंभ कार्य करण्याचे पूर्णपणे थांबला आहे, तर त्या रुग्णाला मेंदू मृत असे घोषित करण्यात येते.  मेंदू मृत म्हणजे मृत्यूच असतो..  तो अंतिम मृत्यूच होय. जरी कृत्रिम श्वासोच्छ्वासाच्या साह्याने  रुग्णाच्या छातीची धडधड चालू असेल तरीही वेंटीलेटर काढल्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू शंभर टक्के निश्चित असतो.  अशा रुग्णाला मेंदूमृत म्हणतात.  म्हणजे मेंदूमृत रुग्ण हा नेहमी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात व व्हेंटिलेटरवर असतो.  विशिष्ट परीक्षणांद्वारे त्याचा मेंदू पूर्णपणाने कार्य करण्याचे थांबलेला आहे हे निश्चित करता येते, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.  त्यावेळेला त्या रुग्णाच्या शरीरातील आठ ते नऊ अवयव एखाद्या रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी प्रत्यारोपित करता येतात.  

सुमारे चाळीस ते पन्नास अवयव हे एखाद्या रुग्णाच्या आयुष्यात त्याच्या अवयवाची कमी झालेली कार्यक्षमता वाढविण्यासाठी अथवा अवयवांमधे निर्माण झालेले दोष दूर  करण्यासाठी प्रत्यारोपित करता येतात. त्यात प्रामुख्याने पुढील अवयवांचा समावेश होतो……. 

दोन मूत्रपिंडे, यकृत, हृदय, दोन फुफ्फुसे, स्वादुपिंड, आतडी,  नेत्र. काही अवयव दुसऱ्या रुग्णाच्या शरीरातील दोष दूर करण्यासाठी उपयोगी पडतात, उदाहरणार्थ हात (मेंदू मृत रुग्णाचे हात एखाद्या व्यक्तीच्या तुटलेल्या हातांच्या जागी प्रत्यारोपित करून नैसर्गिक हातांसारखे कार्य करू शकतात) गर्भाशय, कानाचे पडदे, हाडे, कूर्च्या, झडपा वगैरे.  

वरील विवेचनावरून आपल्या लक्षात येईल की कोणत्याही प्रकारे व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचे अवयव किंवा मृतदेह यांचा मानवी कल्याणासाठी उपयोग करता येतो.  त्यामुळे प्रत्येक मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी विशेषत: वारस नातेवाईकांनी जर अवयवदान/ देहदान यास संमती दिली, तर अनेक रुग्णांना त्याचा फायदा होऊ शकतो. आपल्या देशात दरवर्षी पाच लाख रुग्णांचा मृत्यू हा त्यांना प्रत्यारोपणासाठी अवयव उपलब्ध न झाल्याने होत असतो.  यातले कित्येक मृत्यू आपण फक्त आपल्या संकल्पाने आणि आपल्या वारस नातेवाईक यांनी केलेल्या संकल्पपूर्तीने आपण वाचवू शकतो.  

आज आपण अवयवदान / देहदानाचा संकल्प करूया आणि या संकल्पाची माहिती आपल्या कुटुंबियांना देऊन त्यांनाही या कार्यात सहभागी करून घेऊया.   या माणुसकीच्या कार्यासाठी आपल्याला सजग राहता येईल आणि अनेकांचे प्राण वाचवले याचे पुण्य पदरी पाडून घेता येईल. दरवर्षी येणारा हा ‘अवयवदान दिन ‘ ही त्याची सुरुवात करण्याची नांदी ठरावी.  ज्यांनी असे संकल्प केले नाहीत त्यांनी त्याची सुरुवात करावी, ज्यांनी केले आहेत त्यांनी हा विचार आपल्या कुटुंबात, नातेवाईकांमध्ये  व सर्व समाजात पसरवून त्यांचे प्रबोधन करावे. हे आवाहन माणुसकी असणाऱ्या प्रत्येक सजग नागरिकास मी करीत आहे.

(अवयवदानाचा संकल्प नोटो या केंद्र सरकारच्या संस्थेच्या वेबसाइटवर जाऊन अवयवदानाचा फॉर्म भरून करता येतो. त्यांच्या वेबसाईटचा पत्ता पुढील प्रमाणे :  www.notto.gov.in तसेच देहदानाचा संकल्प करण्यासाठी कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीरशास्त्र विभागाकडून देहदानाचे संकल्पपत्र उपलब्ध होऊ शकते.  वैद्यकीय महाविद्यालयांच्या वेबसाइटवरही असे संकल्प पत्र उपलब्ध होऊ शकेल.  ते संकल्पपत्र भरून आपण देहदानाचा ही संकल्प करू शकता.  त्याचप्रमाणे कोणत्याही नेत्रपेढी मार्फत नेत्रदानाचे संकल्प पत्र उपलब्ध होऊ शकते.)

© श्री सुनील देशपांडे

  • माजी डिस्ट्रिक्ट चेअरमन (ऑर्गन डोनेशन) रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३०.
  • उपाध्यक्ष, फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन मुंबई.
  • संचालक, मृत्युंजय ऑर्गन फाउंडेशन, नाशिक.
  • सदस्य, मानवी अवयव प्रत्यारोपण प्राधिकार समिती (महाराष्ट्र शासन)

मो – 9657709640 Email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ निर्वाण षटकम्॥ – आद्य शंकराचार्य — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆  ॥ निर्वाण षटकम्॥ – आद्य शंकराचार्य — मराठी भावानुवाद. ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

॥ निर्वाण षटकम्॥—मराठी भावानुवाद

संस्कृत स्तोत्र : आद्यशंकराचार्य

मनो बुद्ध्यहंकारचित्तानि नाहम् 

न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे

न च व्योम भूमिर् न तेजॊ न वायु: 

चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ॥१॥

मन, बुद्धी मी ना अहंकार चित्त 

कर्ण ना जिव्हा, न नासा न नेत्र

व्योम न धरित्री, नसे तेज वायू

चिदानंदरुपी मी शिवस्वरूपी ||१||

न च प्राण संज्ञो न वै पञ्चवायु: 

न वा सप्तधातुर् न वा पञ्चकोश:

न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायू 

चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ॥२॥

न मी चेतना ना असे पंचवायू

नसे पंचकोष मी ना सप्तधातु

मी वाचा न हस्त ना पादोऽन्य गात्र

चिदानंदरुपी मी शिवस्वरूपी ||२||

न मे द्वेष रागौ न मे लोभ मोहौ 

मदो नैव मे नैव मात्सर्य भाव:

न धर्मो न चार्थो न कामो ना मोक्ष: 

चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ॥३॥

न संतापी द्वेषी नसे लोभ मोह

नसे ठायी मत्सर ना मी मदांध

धन-धर्म-काम  ना मी मोक्षातीत

चिदानंदरुपी मी शिवस्वरूपी ||३||

न पुण्यं न पापं न सौख्यं न दु:खम् 

न मन्त्रो न तीर्थं न वेदा: न यज्ञा:

अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता 

चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ॥४॥

न मी पुण्य-पाप न सौख्य न दुःख

नसे मंत्र, तीर्थ न वेद ना यज्ञ

नसे अन्न वा ना भरविता न भोक्ता

चिदानंदरुपी मी शिवस्वरूपी ||४||

न मृत्युर्न शंका न मे जातिभेद: 

पिता नैव मे नैव माता न जन्म

न बन्धुर् न मित्रं गुरुर्नैव शिष्य: 

चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ॥५॥

मज मृत्युभय ना न जाणे मी जाती 

मला ना पिता-माता मी तर अजन्मी

नसे बंधू स्नेही गुरु शिष्य नसती

चिदानंदरुपी मी शिवस्वरूपी ||५||

अहं निर्विकल्पॊ निराकार रूपॊ 

विभुत्वाच्च सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम्

न चासंगतं नैव मुक्तिर्न मेय: 

चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ॥६॥

विकल्पाविना  मी न आकार मजला 

मी सर्वव्यापी  इन्द्रियात वसला

बंध मला ना मज नाही मुक्ती

चिदानंदरुपी मी शिवस्वरूपी ||६||

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “माझी मैना…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? इंद्रधनुष्य ?

☆ “माझी मैना…” ☆ सौ राधिका भांडारकर 

आज १ ऑगस्ट …. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिन. ( १ ऑगस्ट १९२० ). 

दोन शब्दातच समोरच्या व्यक्तीला जिंकून घेण्याचं सामर्थ्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शब्दात आहे. या राष्ट्रीय पुरुषाने विपुल लेखन केले.

” माझी मैना गावावर राहिली..” हा मला तर त्यांच्या पूर्ण साहित्याचा परमोच्च बिंदूच वाटतो. 

माझी मैना गावाकडे राहिली

माझ्या जीवाची होतीया काहीली

ओतीव बांधा। रंग गव्हाळा।

कोर चंद्राची ।उदात्त गुणांची।

मोठ्या मनाची। सीता ती माझी रामाची ।

हसून बोलायची। मंद चालायची।

सुगंध केतकी। सतेज कांती ।

घडीव पुतळी। सोन्याची।

नव्या नवतीची। काडी दवण्याची।

रेखीव भुवया ।कमान जणू इंद्रधनुची।

हिरकणी हिऱ्याची। काठी आंधळ्याची ।

तशी ती माझी। गरीबाची मैना ।

रत्नाची खाण ।माझा जीव की प्राण।

नसे सुखाला वाण। तिच्या गुणांची छक्कड मी गायली। माझ्या जीवाची होतीया काहिली…।।

ही रचना वाचल्यानंतर सर्वप्रथम मनात येते ती दोन जीवांची झालेली ताटातूट. ती गरिबीमुळे झालेली आहे ..असावी.  राघू— मैने ची जोडी वेगळी होत आहे आणि त्या विरही भावनेत तिच्या प्रेमाचं, देहाचं,तिचं त्याच्या जीवनात असण्याचं नितांत सुंदर आणि ठसकेबाज वर्णन या रचनेत केलेलं आहे.  थोडक्यात हे एक सुंदर प्रेम गीत आहे.

पण ही मैना अधिक व्यापक स्वरूपात समजून घेण्याचा मी प्रयत्न केला आणि मला या रचनेमागचे वेगळे संदर्भ लक्षात आले.  

माझी मैना ही एक छक्कड आहे.  छक्कड हा लावणीचा एक प्रकार आहे.  माझी मैना ही एक राजकीय छक्कड आहे. आणि त्या पाठीमागे अण्णाभाऊंच्या जीवनाची पार्श्वभूमी आहे.

अण्णा भाऊंना गरिबीमुळे त्यांचं मूळ गाव वाटेगाव सोडावं लागलं.  काम धंद्यासाठी त्यांना मुंबई नगरीत यावं लागलं. तिथे त्यांनी मिळेल ते काम केलं.  हेल्पर, बुटपॉलिशवाला, सिनेमागृहात द्वारपाल अशी विविध कामे केली.  ही कामे करता करता कोहिनूर मिलमध्ये ते कामगार म्हणून स्थित झाले.  या ठिकाणी त्यांचा संबंध कामगार चळवळीशी आला आणि त्याच वातावरणात त्यांची लेखन कला बहरली.  ते लेखक, शाहीर बनले.  त्यानंतर याच माध्यमातून त्यांचा संयुक्त महाराष्ट्र लढ्याशी संबंध आला.

चळवळीत कम्युनिस्ट पक्षाचे कार्ड होल्डर म्हणून ते काम करायचे पण ते खरे कलाकार होते.  नाटक, वग, पोवाडे आणि लावण्या लिहून त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची मशाल पेटती ठेवली.  त्याचवेळी माझी मैना ही छक्कड अतिशय गाजली ती एक रूपकात्मक रचना म्हणून.

ही मैना कोण याचे उत्तर या चळवळीत सापडलं.  संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली.( एक मे १९६०) पण बेळगाव आणि कारवार हा भाग महाराष्ट्राच्या सीमेत आला नाही मुंबईतील फाउंटन आणि बेळगाव येथे झालेल्या आंदोलनात शेकडो लोकांनी रक्त सांडले तरी देखील संयुक्त महाराष्ट्र हवा तसा झाला नाही याचं दुःख त्यांच्या मनाला झालं आणि त्यातूनच माझी मैना या छक्कडचा जन्म झाला.  माझी मैना गावावर राहिली हे बेळगाव आणि कारवार या भागासाठी रूपक आहे आणि ही नितांत सुंदर मैना म्हणजेच निसर्गरम्य बेळगाव आणि कारवार.

आजही ही मैना प्रासंगिक आहे. साठ पासष्ट वर्षापूर्वी लिहिलेली ,गायलेली ही छक्कड आजही  तितकीच ताजी तवानी आहे कारण अजूनही सीमा प्रश्न सुटलेला नाही म्हणून “माझी मैना गावावर राहिली” हा सल आहेच.

(कै. विठ्ठल उमप यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीतून आणि अभिनयातून “माझी मैना” प्रचंड लोकप्रिय केली)

तर असा हा अलौकिक लोकशाहीर ! अण्णाभाऊ साठे…..  त्यांनी विपुल लेखन केले. कथा, कविता, गीत, लावण्या, कादंबऱ्या व नाट्य वृत्तांत, प्रवास वर्णने असे सर्व साहित्यप्रकार हाताळले. पण त्यांच्या जीवनातलं श्रेष्ठ साहित्य कार्य म्हणजे त्यांनी लोकसंस्कृतीला रंगभूमीवर प्रतिष्ठा मिळवून दिली. ती गौरवली. जनमानसात रुजवली.

अण्णाभाऊ यांच्या जन्मदिनी या असाधारण लोकशाहीरास  भावपूर्ण श्रद्धांजली.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “गाढवाला सोडलंय? सांभाळा ! सावरा ! …” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ “गाढवाला सोडलंय? सांभाळा ! सावरा ! …” ☆ श्री सुनील देशपांडे

(एका इंग्लिश पोस्टवर आधारित)

एका गाढवाला झाडाला बांधले होते.  

एका मूर्खाने काहीही विचार न करता  ते सोडवले.  

गाढव शेतात घुसले आणि जोरजोरात ओरडू लागले.

हे पाहून शेतकऱ्याच्या पत्नीने चिडून गाढवाला गोळ्या घालून ठार केले.

गाढवाचा मालक चिडला.  त्याने शेतकऱ्याच्या पत्नीला गोळ्या घातल्या.

बायको मेलेली पाहून शेतकरी परत आला, त्याने जाऊन गाढवाच्या मालकाला गोळ्या घातल्या.  

गाढवाच्या मालकाच्या पत्नीने आपल्या मुलांना जाऊन शेतकऱ्याचे घर जाळण्यास सांगितले.

पोरांनी संध्याकाळी उशिरा जाऊन आईची आज्ञा आनंदाने पार पाडली, त्यांना वाटले शेतकरीही घरासह जळाला असेल.  

खेदाची गोष्ट म्हणजे तसे झाले नव्हते…..  शेतकरी परत आला.  तो एकटाच असल्याने त्याला असहाय्य वाटू लागले. त्याने आपले जाती बांधव एकत्र केले आणि त्यांना गाढवाच्या मालकाच्या जातीवरून आरोप करून चिथवले आणि त्यांनी गाढवाच्या मालकाच्या पत्नी आणि दोन मुलांना घरासह आग लावून जाळले.

मग गाढवाच्या मालकाचे जाती बांधव एकत्र झाले आणि त्यांनी शेतकऱ्याच्या जाति बांधवांना शिव्या द्यायला सुरुवात केली. त्यानंतर  दोन्ही जातींमध्ये प्रचंड धुमश्चक्री आणि राडा झाला.

त्यानंतर ठिकठिकाणी जाती-जातींमध्ये व धर्माधर्मांमध्ये उद्रेक सुरू झाले. 

खूपच मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक दंगे सुरू झाल्याने ते शमविण्यासाठी सैन्याला पाचारण करण्यात आले.

सैन्यबळ देशांतर्गत यादवीमध्ये गुंतलेले पाहून शत्रूने देशावर चाल केली….. 

हे सर्व पाहून व्यथित झालेल्या एका साधूने त्या मूर्ख व्यक्तीला म्हटले,  ” बघ तुझ्यामुळे देशावर किती मोठे संकट ओढवले !”

तो म्हणाला, ” मी काय केले ? मी फक्त गाढवाला सोडले.”

तो साधू म्हणाला,  ” हो, पण, त्यावर सर्वांनी अविचाराने चुकीची प्रतिक्रिया दिली, कुणाचे तरी ऐकून कुणाला तरी दोषी ठरवले,  आणि आपल्या मनातल्या भुताला सोडले.”

आता तरी तुम्हाला कळलं का?—- कुणीही काहीही करत नाही. कुणीतरी मूर्ख  तुमच्यातील अहंकाराला चालना देऊन दुष्प्रवृत्तींना जागृत करतो…..

……  त्यामुळे पुढच्या वेळी प्रत्युत्तर देण्यापूर्वी, प्रतिक्रिया देण्यापूर्वी, तक्रार करण्यापूर्वी, दटावण्यापूर्वी किंवा सूड उगवण्यापूर्वी ……  थांबा आणि विचार करा.  काळजी घ्या……  कारण ….  

…… अनेक वेळा कुणीतरी मूर्ख फक्त गाढवाला सोडतो.

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सेवाव्रती हळबे मावशी ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ सेवाव्रती हळबे मावशी ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी 

सन १९८९.  ‘बजाज फाउंडेशन पुरस्कार’ सोहळ्यासाठी बंगलोर (आता बंगलुरू)इथला सुंदर सजवलेला भव्य हॉल , हळुवार सुरांची वातावरण प्रसन्न करणारी मंद धून, फुलांची आकर्षक सजावट केलेले भले मोठे स्टेज, उंची वस्त्रांची सळसळ आणि अनेक भाषांमधील संमिश्र स्वर! अशा अनोख्या वातावरणात देश विदेशातील अनेक मान्यवर व्यक्तींच्या बरोबरीने,  पांढऱ्यास्वच्छ सुती नऊवारी साडीतील मावशी म्हणजे इंदिराबाई हळबे स्टेजवर अवघडून बसल्या होत्या. थोड्यावेळाने घोषणा झाली.’आता महाराष्ट्रातील कोकण प्रांतातील देवरुख या अत्यंत दुर्गम खेडेगावात महिला आणि बाल कल्याणाच्या कार्यातील प्रशंसनीय योगदानाबद्दल श्रीमती इंदिराबाई हळबे यांना जमनालाल बजाज पुरस्काराने सन्मानित करण्यात  येत आहे.’ सभागृहातील टाळ्यांचा कडकडाट  मावशींच्या कानावर पडत होता. पण डोळे भरून आल्याने सारे अस्पष्ट दिसत होते. मावशी जुन्या आठवणींमध्ये  हरवून गेल्या.

चंपावती खरे ही रत्नागिरी जिल्ह्यात एका  लहानशा खेड्यात १९१३ साली जन्मलेली मुलगी. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे चौथीत असताना लग्न झाले. लग्नानंतर इंदिराबाई हळबे होऊन त्या मुंबईला आल्या.

१९२८ते१९३९ असा अकरा वर्षांचा संसार मावशींच्या वाट्याला आला. त्यातच त्यांच्या दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाला.नंतर थोड्याशा आजाराने त्यांच्या पतीचा मृत्यू झाला त्यावेळी त्या फक्त २५ वर्षांच्या होत्या. वेळेवर आणि योग्य औषधोपचार न मिळाल्याने हे मृत्यू झाले होते. या दुःखातून बाहेर येण्यासाठी मावशी देवरुख इथे त्यांच्या बहिणीकडे, त्यांची सर्वात धाकटी मुलगी मीनाक्षी हिला घेऊन काही महिने राहिल्या.

राजा राममोहन राय यांच्या प्रखर लढ्यामुळे ब्रिटिशांनी सतीची परंपरा रद्द केली होती. तरीही विधवांच्या शापित जीवनाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला नव्हता.

देवरुख येथील शांत, निसर्गरम्य वातावरणात मावशींना थोडे मानसिक स्वास्थ्य मिळाले. शैक्षणिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या देवरुख संपन्न होते. देवरुखला मावशींना अनेक विचारवंतांचे सहाय्य आणि मार्गदर्शन लाभले. पूज्य साने गुरुजींची भगवत गीतेवरील मार्गदर्शक व्याख्याने ऐकून त्यांनी आपले जीवन मानवतेच्या सेवेत व्यतीत करण्याचा संकल्प केला.

त्यांच्या सर्व आशा आता मीनाक्षीवर केंद्रित झाल्या होत्या. मीनाक्षीच्या पुढील शिक्षणाच्या दृष्टीने  मावशी  मुंबईला परतल्या. डॉक्टर काशीबाई साठे यांच्याशी त्यांची कौटुंबिक मैत्री होती. मीनाक्षीलाही त्यांच्यासारखे डॉक्टर व्हायचे होते. दुर्दैवाने एका छोट्याशा आजाराचे निमित्त होऊन वयाच्या १३ व्या वर्षी मीनाक्षीचे अकस्मात निधन झाले.

या अंध:कारमय आयुष्याचा सामना करण्यासाठी मावशींनी नर्सिंगचा कोर्स करण्याचे ठरविले. त्यासाठी कमलाबाई होस्पेट यांच्या मातृसेवा संघ, नागपूर इथे प्रवेश मिळवून खूप मेहनतीने त्यांनी नर्सिंग कोर्स पूर्ण केला. तथाकथित समाज नियमांना न मानता मावशींनी हे धाडस केले होते. या वेगळ्या वाटेवरून चालण्याचा खंबीर निर्णय मावशींनी निश्चयाने अमलात आणला. देवरुख हे त्यांनी आपले कार्यक्षेत्र म्हणून निवडले. समाजाच्या जहरी टीकेला आपल्या कृतीतून उत्तर दिले.

मावशींनी जातपात, स्पृश्य- अस्पृश्य, धर्म असली कुठचीही बंधने मानली नाहीत .प्रसूतीमध्ये अडलेल्या बाईसाठी त्या उन्हापावसात, रात्री अपरात्री डोंगरवाटा तुडवीत मदतीला गेल्या. अनेक बालकांना सुखरूपपणे या जगात त्यांनी आणले. एवढेच नाही तर फसलेल्या कुमारीका, बाल विधवा यांनाही आपल्या छत्रछायेखाली घेतले.  त्यांच्या मुलांचे पालकत्वही पत्करले. आजारी, अशक्त, अपंग, अनाथ मुलांच्या त्या आई झाल्या.

रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख इथे त्यांनी उभारलेली ‘मातृमंदिर’ ही संस्था म्हणजे त्यांच्या कार्याची चालती बोलती ओळख आहे. कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना मावशींनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देवरुखला एका गोठ्यात, दोन खाटांच्या सहाय्याने प्रसूती केंद्राची सुरुवात केली. आज त्यांचे कार्य  एक सुसज्ज हॉस्पिटल, फिरता दवाखाना, रूग्ण वाहिका, निराधार बालकांसाठी गोकुळ अनाथालय, कृषी केंद्र, कौशल्य प्रशिक्षण केंद्र, बचत गट, महिला सक्षमीकरण उपक्रम, आरोग्य केंद्र, बालवाड्या, पाळणाघरे असे वटवृक्षासारखे विस्तारले आहे. दुर्दम्य इच्छाशक्ती, शिस्त आणि शुद्ध आचरण यांच्या बळावर समाजाला सावली आणि आधार देणारे अगणित उपक्रम त्यांनी राबविले.  त्याचबरोबर अशा सामाजिक कार्यात झोकून देणाऱ्या तरुणाईच्या पिढ्या घडविल्या. या तरुणाईला त्यांनी पुरोगामी विचारांचे, विज्ञान निष्ठेचे आणि श्रमप्रतिष्ठेचे  शिक्षण स्वकृतीतून दिले. अनेक सामाजिक चळवळींना हक्काचा निवारा दिला. खेड्यापाड्यातून आलेल्या, देवरुख महाविद्यालयात शिकणाऱ्या अनेक गरीब मुलांसाठी मावशींनी शेतावर मोफत होस्टेलची व्यवस्था केली. यातील अनेक मुलांना शेतावर, रुग्णालयात, मेडिकल स्टोअर, आयटीआय, पाणलोट प्रकल्प, कृषी प्रकल्प आदी विविध कार्यामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या मनावर मूल्याधिष्ठित संस्कार केले.

१९९८ मध्ये मावशी गेल्यानंतर काही काळाने संस्थेच्या कार्याला विस्कळीतपणा आला होता .आज श्री अभिजीत हेगशेट्ये  आणि त्यांचे अनेक तडफदार सहकारी यांच्यामुळे मातृमंदिर  पुन्हा जोमाने कार्यरत झालेआहे. त्यांनी दिलेल्या संस्काराचा वारसा जिवंत आहे. याचे  आत्ताचे उदाहरण म्हणजे कोविड काळात मातृमंदिरने शेकडो  कोविडग्रस्तांसाठी ‘ऑक्सिजन आधार प्रकल्प’ उभारला आणि अनेक रूग्णांचे प्राण वाचविले.२०२१ च्या पुरामध्ये उध्वस्त झालेल्या कोकणवासियांना मातृमंदिरने पुढाकार घेऊन  अनेक प्रकारची मदत केली. स्वच्छता अभियान राबविले.

देवरुख परिसरातील ६०-७० गावातील जनतेसाठी आता मातृमंदिर संस्थेतर्फे अद्ययावत सुविधा देणारे सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारले जात आहे. अनेक दानशूर लोकांनी मातृमंदिर संस्थेला  आर्थिक मदत केली आहे.

समाजाचा पाया सुदृढ व्हावा म्हणून अनेक स्त्रियांनी तत्कालीन सामाजिक रुढी, जाचक निर्बंध दूर सारून स्वतःचे आयुष्य पणाला लावले. साहजिकच त्यांची वाट काट्याकुट्याची होती. शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, विज्ञान अशा अनेक क्षेत्रात या स्त्रियांनी भरीव योगदान दिले. त्या पायाचा दगड बनल्या म्हणून आजची स्त्री अनेक क्षेत्रात ताठ मानेने उभी राहू शकत आहे. अशा अनेक तेजस्वी तारकांमधील सन्माननीय हळबे मावशींना  सहस्र प्रणाम 👏

–++++–

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares