☆ “एका खऱ्याखुऱ्या पितृहृदयाची सत्यकथा…” मूळ इंग्रजी लेखक : अज्ञात ☆ भावानुवाद – श्री सुनील देशपांडे ☆
श्री के पी रामास्वामी
एका खऱ्याखुऱ्या पितृहृदयाची सत्यकथा…
२७, ५०० मुली असलेला माणूस ?
हो! त्याला असेच म्हणतात – अप्पा.
(दक्षिणेमध्ये वडिलांना आप्पा असे संबोधतात)
त्याचे खरे नाव? के पी रामास्वामी. कोइम्बतूर येथील केपीआर मिल्सचे मालक. व्यवसायाने कापड उद्योगपती. कर्मचारी त्यांना अप्पा असे संबोधतात
कॉर्पोरेट क्षेत्रातील नेते कर्मचारी टिकवून कसे ठेवावे? खर्च कसे कमी करावे आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काय करावे. असेच सर्व बोलत असताना, हा माणूस संपूर्ण जीवनक्रम बदलण्यात व्यस्त आहे.
कसे?
गिरणी कामगारांना पदवीधर बनवून. शिक्षणाला चांगल्या जीवनाची पायरी बनवून.
हे सर्व एका साध्या विनंतीने सुरू झाले. त्याच्या गिरणीतील एका तरुण मुलीने एकदा त्याला सांगितले होते –
“अप्पा, मला शिक्षण घ्यायचे आहे. माझ्या पालकांनी गरिबीमुळे मला शाळेतून काढून टाकले, पण मला पुढे शिक्षण घ्यायचे आहे. “
त्या एका वाक्याने सर्व काही बदलले…
त्याच्या कामगारांना फक्त पगार देण्याऐवजी, त्याने त्यांना भविष्य देण्याचा निर्णय घेतला.
त्याने गिरणीतच एक पूर्ण शिक्षण व्यवस्था उभारली.
आठ तासांच्या शिफ्टनंतर चार तासांचे वर्ग.
वर्गखोल्या, शिक्षक, मुख्याध्यापक, अगदी योग अभ्यासक्रम देखील.
सर्व काही पूर्णपणे निधीयुक्त. कोणतीही फी नाही, अट नाही.
आणि निकाल?
२४,५३६ महिलांनी त्यांच्या १०वी, १२वी, पदवी आणि पदव्युत्तर पदवी मिळवल्या आहेत.
अनेक आता परिचारिका, शिक्षिका, पोलिस अधिकारी आहेत.
या वर्षीच तामिळनाडू मुक्त विद्यापीठातून २० मुली सुवर्णपदक विजेत्या झाल्या
आता, तुम्हाला अपेक्षा असेल की एखाद्या व्यावसायिकाला कामगार नोकरी सोडून जाण्याची चिंता असेल. जर या महिला निघून गेल्या तर काय? कामगार स्थिरतेचे काय?
के पी रामास्वामी काय म्हणतात ते येथे आहे –
“मी त्यांना गिरणीत ठेवून त्यांची क्षमता वाया घालवू इच्छित नाही. त्या गरिबीमुळे येथे आहेत, स्वेच्छेने नाही. माझे काम त्यांना भविष्य देणे आहे, पिंजरा नाही. “
आणि तो नेमके तेच करतो….
त्या निघून जातात. स्वतःचे करिअर घडवतात.
आणि मग? त्या त्यांच्या गावातील अधिक मुलींना गिरणीत पाठवतात. हे चक्र सुरूच आहे.
हा केवळ सीएसआर उपक्रम नाही. हा खऱ्या अर्थाने मानव संसाधन विकास आहे.
अलिकडेच झालेल्या एका दीक्षांत समारंभात ३५० महिलांना त्यांच्या पदव्या मिळाल्या. आणि के पी रामास्वामी यांनी एक असामान्य विनंती केली –
“जर तुम्ही किंवा तुमच्या मैत्रिणी त्यांना कामावर ठेवू शकलात, तर त्यामुळे इतर मुलींना पुढे शिक्षण घेण्याची आशा मिळेल. “
विचार करा. कोट्यवधी रुपयांचे साम्राज्य चालवणारा माणूस व्यवसाय मागत नाही. तो नोकऱ्या मागत आहे – त्याच्या कामगारांसाठी.
आपण हे कधी कुठे पाहिले आहे?
ही कथा फक्त केपीआर मिल्सबद्दल नाही. ही नेतृत्व, कॉर्पोरेट नीतिमत्ता, राष्ट्र उभारणीचा धडा आहे.
बी-स्कूलने हे शिकवले पाहिजे.
एचआर व्यावसायिकांनी याचा अभ्यास केला पाहिजे.
आणि जगाला हे जाणून घेण्याची आवश्यकता आहे.
प्रत्येकाला समजेल अशी ही सगळीकडे पसरवण्यासारखी सत्यकथा. तुम्ही काय करणार. पोहोचवणार इतरांपर्यंत?
☆ पुस्तकंसुद्धा युद्धावर गेली होती त्याची गोष्ट – – ☆ सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆
मध्यंतरी ‘लोकसत्ता’ मधील बुकमार्कच्या पानावर आलेला ‘आणि पुस्तके चालू लागली’ हा लेख वाचल्यावर साहजिकच नुकतंच हाती आलेलं पुस्तक आठवलं. पुस्तकाचं नाव: ‘When Books Went To War’ आणि लेखिका आहे, मॉली गप्टील मॅनिंग. माझी एक सवय आहे पूर्वीपासून, चांगल्या लेखकांची पुस्तकं वाचत असताना, त्यात कधी, कुठे त्यांनी वाचलेल्या चांगल्या पुस्तकाचं नाव, संदर्भ आला, की मी लगेच ते नाव माझ्या वाचायच्या पुस्तकांच्या यादीत लिहून ठेवते. असंच या पुस्तकाबद्दल मी बहुधा निरंजन घाटे यांच्या ‘मी वाचत सुटलो, त्याची गोष्ट’ या पुस्तकात वाचून लिहून ठेवलेलं होतं. हे पुस्तक तेंव्हा माझ्या मुलानं मला पाठवलं होतं.
1933 च्या सुमारास जर्मनीमधे अर्थातच, हिटलर आणि त्याचा लाडका सेनापती गोबेल्स यांच्या डोक्यातून निघालेली आणि शाळा-कॉलेज मधे शिकणाऱ्या उत्साही किशोरवयीन आणि तरुण मुलांमार्फत राबवून घेतलेली एक भयंकर मोहीम होती. दुसऱ्या महायुद्धाबद्दल आपण बरंच काही वाचलेलं असतं, पण या मोहिमेबद्दल मात्र या आधी मी तरी कुठेही, काहिही वाचलेलं नव्हतं.
जर्मनीतील मोठमोठ्या शहरात, मध्यवर्ती चौकात मोठ्ठाल्ले ओंडके चितेसारखे रचून त्यात शेकडो, हजारो पुस्तकांच्या आहुती दिल्या गेल्या! बर्लिन, फ्रॅन्कफर्ट अशांसारख्या शहरातील विद्यापिठांच्या वाचनालयातील उत्तमोत्तम ग्रंथ आणून या होमात त्यांची आहुती देण्यात आली!
हजारो विद्यार्थी आपापल्या विद्यापिठांचे विशिष्ट रंगाचे कपडे घालून, हातात मशाली घेऊन मोठ्या अभिमानाने या मिरवणुकीत सामील झालेले होते. बर्लिनच्या मुख्य चौकात होणाऱ्या या ‘समारंभां’ साठी पावसाळी हवा आणि प्रचंड गारठा असतानाही चाळीस हजार प्रेक्षक हजर होते. आणि अशा पावसाळी हवेतही या मुलांचा उत्साह, आनंद उफाळून ओसंडत होता!
कितीतरी गाड्या “अन-जर्मन” पुस्तकं भरून घेऊन या मिरवणुकीत सामील झालेल्या होत्या. आणि हे विद्यार्थी(?) मानवी साखळी करून एकमेकांकडे देत, ही पुस्तकं त्या चितेत भिरकावत होते. नाझी एकतेच्या विरोधी विचार असलेली सर्व पुस्तकं ही देशद्रोही ठरवून नष्ट केली जात होती. देशाच्या प्रगतीला विरोधी विचारांमुळे अडथळा निर्माण होत आहे, म्हणून, हे विचार असलेली पुस्तकं जाळण्यायोग्य आहेत, असं या विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यात आलेलं होतं. सिग्मंड फ्रॉईड, एमिल लुडविग, एरिक मारिया रिमार्क हे सगळे लेखक, तज्ञ देशविरोधी लिखाण करत आहेत, असं सांगून त्यांची पुस्तकं जाळण्यात आली. एका मागून एक मोठमोठ्या लेखकांची, शास्त्रज्ञांची पुस्तकं जाळली जात होती, आणि गर्दीमधून हर्षनाद, आरोळ्या उठत होत्या. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे घडवून आणलेला आहे, अशा अफवा उठलेल्या असल्या, तरी, या कार्यक्रमात येऊन गोबेल्सने भाषण दिल्याने हा कार्यक्रम कोणाच्या आशीर्वादाने घडवून आणला गेलेलं आहे, हे जाहीर झाले! हिटलरच्या आदर्शवादाशी जुळणारी विचारसरणी समाजात निर्माण करण्यासाठी तो आपली ताकद वापरत असे.
बर्लिनच्या या कार्यक्रमाला भरपूर प्रसिद्धी मिळावी म्हणून तो चालू असताना, रेडिओवर त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले आणि तो चित्रितही करण्यात आला. आणि नंतर देशभरातल्या थिएटर्समधे ही फिल्म मुख्य चित्रपटाआधी दाखवण्यात येऊ लागली. जसजसा हा प्रचार होत गेला, तसतसे ठिकठीकाणी असे पुस्तकं जाळण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ लागले. ज्यू विद्वान व लेखकांची तर सर्व पुस्तकं जाळण्यात आलीच, पण समता, बंधुत्व, समन्यायी व्यवस्था यावर लिहिणाऱ्या लेखकांच्या पुस्तकांनाही तोच रस्ता दाखवण्यात आला!
नंतर तर नाझींनी लेखकांची, पुस्तकांची यादीच जाहीर केली. कार्ल मार्क्स, अप्टन सिंक्लेयर, जॅक लंडन, हेन्रीक मान, हेलन केलर, अल्बर्ट आईनस्टाईन, थॉमस मान आणि ऑर्थर स्च्नित्झलर. प्रत्येक ठिकाणी आयोजित केलेल्या पुस्तकं जाळण्याच्या कार्यक्रमाला असाच हजारोंचा समुदाय जमलेला असायचा आणि या प्रत्येक कार्यक्रमाची प्रचंड प्रसिद्धी देशभर केली जात असे.
पण हेलन केलर पासून अनेक मोठ्या, नोबेल पारितोषिक विजेत्या लेखकांनीही या गोष्टीचा विद्यार्थ्यांच्या नावे पत्र लिहून निषेध केला. एच. जी. वेल्सने लंडनमधे निषेधपर जोरदार भाषण केले. 1934 मधे, पॅरीसमधे अशा जर्मनीत जाळलेल्या आणि बंदी घातलेल्या पुस्तकांची लायब्ररी स्थापन करण्यात आली. जर्मनीतून आलेल्या काही निर्वासितांनी देणगी म्हणून अशी पुस्तके या लायब्ररीला दिली. आणि युरोपातील लोकांनीही आपल्याकडे असलेल्या अशा चांगल्या लेखकांची पुस्तकं या लायब्ररीला देणगीदाखल दिली.
अमेरिकेतही वर्तमानपत्रांमधून जर्मनीतील या असंस्कृत मोहिमेचा जाहीर निषेध करण्यात आला.
नंतर हळुहळू हिटलरची मजल पुस्तकांकडून ज्यू लोकांच्या छ्ळापर्यंत, त्यांच्या उच्च्चाटनापर्यंत जाऊन पोचली आणि मग त्याने युरोपातले लहान-सहान देश आक्रमण करून गिळंकृत करायला सुरुवात केली. एवढंच नव्हे, तर फ्रेंच रेडीओ वरून त्यांच्या विरूद्धच अपप्रचाराची राळ उडवत आपली वक्र नजर फ्रान्स आणि इंग्लंड वरही असल्याचं जाहीर केलं! आणि मग सगळा युरोपच युद्धाच्या ज्वाळांमधे होरपळू लागला.
हिटलरचा लोकशाही विरोध शेवटी अमेरिकेपर्यंत पोचणार याची निश्चिती वाटू लागल्यावर अमेरिकेलाही खडबडून जागं व्हावं लागलं. पहिल्या महायुद्धानंतर विस्कळीत झालेली सर्व युद्धयंत्रणा परत रुळावर आणण्याचं अवघड काम आधी करावं लागणार होतं.
सुरुवातीला जेंव्हा 1939-40 मधे युरोपात युद्धज्वाळा फैलावू लागल्या होत्या, तेंव्हा अमेरिकन नागरिकांचा या युद्धात सामील व्हायला विरोधच होता. पण बरेच जण असे होते, की ज्यांना यातली अपरिहार्यता कळत होती. ‘न्यूयॉर्क टाईम्स’ सह अनेक प्रमुख वृत्तपत्रांनी लष्करी प्रशिक्षण सक्तीचे करण्यासाठी यंत्रणा उभारण्याचा अप्रिय सल्ला सरकारला दिलेला होता. त्यांनी हिटलरचे लष्कर किती शक्तिमान आणि यंत्र-शस्त्र सज्ज आहे, आणि त्याने फ्रांसला कसे जेरीस आणले आहे, याचाही दाखला दिला होता. आणि आपण बेसावध असताना जर या सुसज्ज लष्कराला तोंड द्यायची वेळ आली तर कशी दुर्दशा होऊ शकते, याचीही कल्पना दिलेली होती.
हिटलरने स्वतःला लोकशाहीचा कट्टर शत्रू म्हणून जाहीर केले होते आणि अमेरिका ही सर्वात मोठी, सर्वात श्रीमंत आणि सर्वात सौम्य-सभ्य अशी लोकशाही नव्हती काय? आणि ‘शत्रू बेसावध असतानाच त्याच्यावर हल्ला करून त्याला गारद करायचा’ हाच हिटलरचा प्रमुख डावपेच असायचा. तेंव्हा आपण वेळीच सावध होऊन तयारीला लागलं पाहिजे, असा त्या वृत्तपत्रांमधील लेखांचा एकूण रोख होता.
1940 च्या सप्टेंबर मधे अमेरिकेच्या कॉन्ग्रेसने ‘सिलेक्टिव्ह ट्रेनिंग अॅन्ड सर्व्हिस’ कायदा मान्य केला. या कायद्यानुसार 21 ते 35 या दरम्यान वय असलेल्या सर्व पुरुषांना लष्करी सेवेत भारती होणे आवश्यक होते. नंतर या कायद्यात दुरुस्ती करून 18 ते 50 वयाच्या पुरुषांना लष्करी सेवेत भरती होणे अनिवार्य करण्यात आले.
लष्करात भरती झालेल्या या लाखो लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी, लष्कराने 46 केंद्र बांधून फर्निचरसकट सज्ज करायचं ठरवलं होतं, पण तेवढा निधीच त्यांच्याकडे उपलब्ध नव्हता. त्यामुळे या सक्तीची भरती केलेल्या लोकांना प्रशिक्षण देणं तर दूरच, उलट त्यांच्या रहाण्या-खाण्याची व्यवस्था करण्याचे मोठेच आव्हान लष्करापुढे उभे राहिले. अगदी तळामुळापासून करायच्या या तयारीला खूप दिवस लागणार होते. आणि त्यासाठी लागणारा पैसा सरकारकडून मंजूर होऊन मिळायलाही वेळच लागणार होता!
आधी सक्तीची लष्कर भरती आणि नंतर पैसा हातात येईल तेंव्हा कॅम्प तयार करणं यामुळे या भरती झालेल्या लोकांचे विलक्षण हाल झाले. त्यामुळे त्याचं मानसिक धैर्य खूप खच्ची झालं! अनेक कॅम्प्समधे रहाण्याची, जेवणखाण्याची आणि शौचालये किंवा स्नानगृहांची व्यवस्था नव्हतीच जवळपास! आणि या लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक अशा युद्धसामग्रीचाही पत्ता नव्हता. लष्कराची अवस्था खरोखरच शोचनीय झालेली होती!
अशा तऱ्हेने उपलब्ध साधनसामग्री मर्यादित कसली, जवळपास नसतानाही, संगीत (गाणा-यांनी गाणे!) आणि मर्दानी खेळ यांनी थोडीफार करमणूक करून घेत असत हे प्रशिक्षणार्थी. पण एकमेकांना अनोळखी असलेल्या या लोकांना इतक्या वाईट परिस्थितीत सतत एकमेकांबरोबर रहावं लागत असल्यामुळे, मोकळा वेळ असेल तेंव्हा शक्यतो एकटं बसावं, घरच्यांना पत्रं लिहावीत किंवा एकट्यानेच काहीतरी वाचत बसावंसं वाटत असे.
लष्करातील वरचे अधिकारी हे जाणून होते, की या कॅम्प्समधील रहाणीचा दर्जा सुधारल्याशिवाय आणि या प्रशिक्षणार्थींना हवी असलेली करमणूक, मनोरंजन याची व्यवस्था केल्याशिवाय त्यांचं मानसिक धैर्य उंचावणार नाही, आणि परिणामकारक प्रशिक्षणही देता येणार नाही. ही गोष्ट अत्यंत महत्वाची, निर्णायक आहे!
पण जिथे रहाण्यासाठी इमारती आणि चालवण्यासाठी बंदुकी अशा लष्करी प्रशिक्षणासाठी आवश्यक अशा प्राथमिक गोष्टी पुरवण्यासाठीच धडपड चाललेली असताना चित्रपटगृहे आणि खेळांसाठीच्या उत्तम सुविधा पुरवणं अशक्यच होतं! तेंव्हा, त्यांना अशी करमणूक द्यायला हवी होती, की जी लोकप्रियही असेल आणि परवडणारीही! आणि ती म्हणजे पुस्तकंच होती त्या काळात!
मोबाईल फोन नव्हते, आणि टी. व्ही. पण प्रत्येक काना कोपऱ्यात पोचलेले नव्हते असा तो काळ होता. इतके लोक पुस्तकं वाचण्यासाठी इतके उत्सुक होते, हे वाचूनच मन भरून येतं!
पहिल्या जागतिक युद्धाच्या वेळीही सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी पुस्तकं पुरवण्यात आली होती, पण या दुसऱ्या महायुद्धात जितक्या जास्त संख्येने पुस्तकं पुरवण्यात आली, तो जागतिक विक्रम अजून मोडला गेलेला नाही!
या पुस्तकांसाठी एक मोठी मोहीमच अमेरिकेत, देशभरात चालवली गेली! देशभरातील ग्रंथपालांची (लायब्ररीयन्स) एक संघटना होती. तिच्या सभासदांनी एकत्र येऊन, स्वयंसेवकांची मदत घेऊन एक देशव्यापी मोहीम आखली. जागोजागी, ठिकठिकाणी छापील पत्रकं लावली. या पत्रकांमध्ये आपापल्या घरी असलेली पुस्तकं सैनिकांसाठी दान करायचं आवाहन केलेलं होतं. ही पुस्तकं ज्या त्या गावातल्या लायब्ररीत आणून द्यायची होती. मग तिथून ती एका ठिकाणी गोळा करून जिथे जिथे सैनिक लढत होते, किंवा प्रशिक्षण घेत होते, तिथे तिथे पोचवण्यात आली.
जवळपास 40 लाख पुस्तकं अशा प्रकारे गोळा करून सैनिकांसाठी पाठवण्यात आली. या मोहिमेसाठी कित्येक जणांचा हातभार, कष्ट, पैसा सगळंच कामी आलं होतं. हे सगळे तपशीलही मुळातून वाचण्याजोगे आहेत. विस्तारभयास्तव इथे देता येत नाहीत.
या पुस्तकांनी सैनिकांसाठी काय केलं, हे अमेरिकन लष्करातील एका मेजरच्या शब्दात : “आमच्या, आणि आमच्याबरोबर लढणाऱ्या इतर देशांच्याही सैनिकांचं आयुष्य जगण्याजोगं केलं या पुस्तकांनी! अमेरिकन सैनिकांचं ते विलक्षण चैतन्यही जागं केलं या पुस्तकांनी! आणि आमचे सैनिक अजूनही माणूस म्हणवून घेण्याच्या लायकीचे राहिलेत तेही या पुस्तकांमुळेच!”
अशा प्रकारे, हिटलरने सुरु केलेल्या फक्त युद्धालाच नव्हे, तर त्यानं प्रत्यक्षात आणलेल्या पुस्तकं जाळण्याच्या अमानुष, असंस्कृत मोहिमेला अमेरिकेने हे सुसंस्कृत, जोरदार उत्तर दिलेलं होतं आणि माणसाविरुद्ध आणि माणुसकीविरुद्ध चालवलेल्या प्रत्यक्ष युद्धात आणि सांस्कृतिक युद्धातही हिटलरचा दणक्यात पराभव केला, त्याची ही कहाणी!
☆ “भारतीय सेनेतील योद्धा धन्वंतरी… – भाग – ३”☆ श्री संभाजी बबन गायके☆
(खरंच तसंच झालं होतं…. त्याच्या डोक्याला एक गोळी चाटून गेली होती ! डॉक्टरसाहेबांनी त्याला धीर नसता दिला तर तो कदाचित घाबरल्याने आणखीन गंभीर झाला असता !) – इथून पुढे —
दुसरी रात्र… पुन्हा एक चढाई.. आज आणखी एक शिखर काबीज करायचे होते…. जाताना एक सैनिक म्हणाला… ”जा रहा हूं साहब. ” त्यावर डॉक्टर साहेब सहज म्हणाले होते… ”देखो, जा तो रहे हो… लेकीन जीत के ही वापस आना!” तासाभरात तोच सैनिक जखमी होऊन उपचारासाठी परत आला! प्रचंड गोळीबारात त्याच्या कमरेला गोळी लागली होती… पण कमरेला बांधलेल्या गोळ्यांच्या सहा मॅगझीन (गोळ्या ठेवण्यासाठीची व्यवस्था) पैकी एका मॅगझीन मधल्या एका स्प्रिंगमध्ये ती गोळी अडकून बसली… हा बचावला! दुसरी गोळी डाव्या खांद्याला लागली…. हा उजव्या हाताने लढला… मग उजव्या हातालाही गोळी लागली… नाईलाज झाला! “साहब, मुझे पैरोंसे फायरींग सिखाई गयी होती तो मैं पैरोंसे भी लडता! लेकीन वापस नहीं आता… आप मुझे ठीक कर दो.. मै फिरसे जाना चाहता हूं लडने के लिये!”
एका सैनिकाच्या तर नाकात गोळी घुसली होती… त्याचे नाकच नाहीसे झाले होते… पण निष्णात डॉक्टर राजेश यांनी त्यालाही वाचवले… आता तो माजी सैनिक व्यवस्थित आहे.
हे एवढे देशप्रेम, एवढी हिंमत सैनिकांच्या मनात येते तरी कुठून हा प्रश्न तर अजूनही अनुत्तरीत आहे डॉक्टरांच्या मनातला. पण यातून एक निश्चित होते.. ते म्हणजे आपल्या देशाला अशा सैनिकांची वानवा नाही… आणि असणारही नाही!
आपल्या महाराष्ट्रात वर्धा जिल्ह्यात एक गांव आहे.. आष्टी नावाचे. या गावाला शहीद आष्टी म्हणून इतिहासात ओळख आहे… १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात या गावातील पाच नागरीकांनी महाराष्ट्रात सर्वांत प्रथम प्राणांची आहुती दिली होती म्हणून हे गाव शहीद अर्थात हुतात्मा आष्टी! येथे एक हुतात्मा स्मारक उभारले गेले आहे. राजेश यांचा जन्म याच गावातला. वडील वामनराव डॉक्टर तर आईचे नाव कुमुदिनी. त्यांची शाळा या स्मारकामध्ये दरवर्षी स्वातंत्र्य दिनी विशेष कार्यक्रम करीत असे. या कार्यक्रमात देशभक्तीपर गीते गायली जात… शाळकरी राजेश या गाण्यांच्या वाद्यवृंदामध्ये बासरी वाजवणा-या मुलांच्या पहिल्या रांगेत असत. तिथूनच त्यांच्यावर देशप्रेमाचे संस्कार झाले. राजेश यांनी पुढे उत्तम शिक्षण घेऊन डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजात एम. बी. बी. एस. साठी प्रवेश मिळवला आणि डॉक्टर झाले! समाजासाठी काही तरी उत्तुंग करण्याची त्यांची मनोमन इच्छा होती. आपण आय. ए. एस. अधिकारी व्हावं, ग्रामीण भागात जनतेची प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून सेवा करावी, असे त्यांच्या मनाने घेतले आणि ते घरी न सांगता थेट दिल्लीला पळून गेले… तेथे त्यांनी आय. ए. एस. होण्यासाठीच्या प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेतला. दिल्लीत राहण्याची सोय नव्हती म्हणून खासदार महोदयांच्या निवासस्थानी मुक्काम केला. यु. पी. एस. सी. ची तयारी करीत असताना काही पैसे कमवावेत म्हणून त्यांनी तिथल्या सफदरजंग रुग्णालयात डॉक्टर म्हणून तात्पुरती नोकरी स्वीकारली.. दिवसातील जवळजवळ वीस तास ते डॉक्टर म्हणून सेवा बजावत. त्यातच त्यांच्या एका वरिष्ठ सहकारी डॉक्टरांनी त्यांना लष्करी डॉक्टर होण्याचा सल्ला दिला… आणि तीन हजार उमेदवारांमधून डॉक्टर राजेश आढाव पहिल्या साडेतीनशे मध्ये निवडले गेले. पहिलेच जबाबदारी मिळाली ती जम्मू-कश्मीर मध्ये तैनात असलेल्या १३, जम्मू & काश्मीर रायफल्सचे वैद्यकीय अधिकारी म्हणून. सुमारे आठशे ते हजार सैनिक-अधिकारी यांच्या प्रकृतीची काळजी घेण्याचे काम! लवकरच डॉक्टर राजेश या कामांत रुळले… सैनिकी गणवेश अंगावर चढताच त्यांच्यातील देशभक्त, समाजसेवक पूर्ण जागा झाला!
जवान राजेश यांना डॉक्टर देवता म्हणून संबोधत असत. त्यांनी उपचार केले तर रुग्ण निश्चित जगतो.. असे ते मानीत असत. आणि ते खरे ही होते.. कारगिल लढाईत त्यांनी ९७ जवान आणि अधिकारी यांचे प्राण वाचवण्यात मोठी भूमिका बजावली. त्यासाठी त्यांना विशेष सन्मान देण्यात आला!
सैनिकांचा खूप विश्वास त्यांनी कमावला होता. लढाईच्या काळात…. उंच पहाडावर असलेल्या सैनिकांना जेवण पोहोचवले जायचे. पहाटे बनवलेले खाद्यपदार्थ पहाडावर पोहचेपर्यंत खूप उशीर व्हायचा. एकदा भात दही असा बेत होता. तेथील वातावरणामुळे त्या भातावर असलेल्या दह्यावर एक वेगळाच थर दिसू लागला. जवानाना वाटले की दही खराब झाले… खायचे कसे? यावेळी डॉक्टर राजेश यांनी स्वत: ते दही खाल्ले… आणि म्हणाले… ”अगर मुझे आधे घंटे तक कुछ नहीं होता है.. तो यह दही खाने लायक है ऐसा समझो… ! ते पाहून ते भुकेलेले सर्वजण दही भातावर तुटून पडले! जवान मजेने म्हणायचे यह डॉक्टर साहब तो जादू टोना के डॉक्टर है!
एल. ओ. सी. कारगिल चित्रपटात मिलिंद गुणाजी यांनी डॉक्टर राजेश यांची भूमिका केली होती. विक्रम बात्रा साहेबांच्या जीवनावर आधारीत चित्रपटातही डॉक्टर राजेश यांची भूमिका दाखवली गेली आहे.
कर्नल डॉक्टर राजेश आढाव यांच्या पत्नी दिपाली या प्रसिद्ध डॉक्टर आहेत. कारगिल मधून परतल्यावर 2 डिसेंबर २००१ रोजी डॉक्टर साहेब दिपाली यांचेशी विवाहबद्ध झाले… आणि तेरा दिवसांनी कर्तव्यावर पोहोचले… ऑपरेशन पराक्रम मध्ये भाग घेण्यासाठी!
त्यांचे चिरंजीव ओम एम. बी. बी. एस. चा अभ्यास करत आहे. ओम लहान असताना जेंव्हा राजेश साहेबांच्या कारगिलच्या कहाण्या ऐकायचा… तेंव्हा त्याला त्या ख-या वाटत नसत… पण तो मोठा झाला आणि त्याला आपल्या पित्याची महान कामगिरी माहीत झाली!
कारगिल लढाईत एका डॉक्टर साहेबांना गोळी लागून ते हुतात्मा झाल्याची बातमी पसरली होती. ही बातमी घेऊन जेंव्हा बातमीदार डॉक्टर राजेश यांच्या घरी पोहोचले तेंव्हा यांच्या मातोश्री यांनी दिलेले उत्तर मोठे मार्मिक होते… त्या म्हणाल्या… आम्ही दूध विकतो.. त्यात मी कधी एक थेंब पाणी मिसळले नाही… माझ्या मुलाला असे काही होणारच नाही! आणि त्यांचे शब्द खरे झाले… डॉक्टर साहेब सुखरूप होते… बातमी अर्धवट होती… राजेश यांना बॉम्बमधील धारदार splinter लागून त्यांना जखम झाली होती! दुधात थेंबभरही पाणी न घालणे याचाच अर्थ पूर्ण प्रामाणिक व्यवहार! यातून संस्कारही दिसतात!
कारगिल युद्धावेळी captain असलले डॉक्टर राजेश पुढे कर्नल पदावर पोहचले… त्यांना सेना मेडल दिले गेले. अशी कामगिरी करणा-या मोजक्या आर्मी डॉक्टर्समध्ये राजेश साहेबांचा समावेश आहे.
पुढे कोरोना काळातही डॉक्टर राजेश यांनी सैन्याची काळजी यशस्वीरीत्या घेतली. त्याबद्दल त्यांचे कौतुकही झाले.
२९ जानेवारी, २०२५… आफ्रिकेतील कांगो येथून एक बातमी आली… संयुक्त राष्ट्र शांतीसेनेत तिथल्या लष्करी रुग्णालयाचे प्रमुख कर्नल डॉक्टर राजेश आढाव यांच्या निवासस्थानाच्या कुंपणावर एक नव्हे तर दोन RPG अर्थात Rocket Propelled Grenade म्हणजे रॉकेटवर बसवून डागला जाणारा हातगोळा पडला! पण सुदैवाने राजेश साहेब केवळ दहा सेकंद आधीच तिथून बाहेर पडले होते! त्यांचे आई-वडील, पत्नी यांची पुण्याई थोर आहे.. हेच खरे!
काल ६ फेब्रुवारी रोजी कर्नल डॉक्टर राजेश आढाव साहेबांचा वाढदिवस होता. त्यानिमित्त माहिती घेऊन हा लेख लिहिला आहे. यात चुका तर असतीलच. पण डॉक्टर साहेबांचा पराक्रम अधिक लोकांना माहीत व्हावा… म्हणून हे धाडस केले आहे. विविध मुलाखाती, बातम्या पहिल्या… आणि किंचित लेखन स्वातंत्र्य घेऊन, कोणाचीही परवानगी न घेता लिहिले आहे.. क्षमस्व! पण माझी भावना प्रामाणिक आहे! कर्नल डॉक्टर राजेश अढाऊ (Adhau असे spelling लिहिले जाते बऱ्याच ठिकाणी) यांच्यावर एक छान चित्रपट निघावा.. ही इच्छा आहे. किमान नव्या पिढीला आपल्या बहाद्दर माणसाची माहिती तर होईल. जयहिंद.
☆ “भारतीय सेनेतील योद्धा धन्वंतरी… – भाग – १”☆ श्री संभाजी बबन गायके☆
कर्नल डॉक्टर साब !
“मर्द गड्यांनो… मी येईपर्यंत दम धारा… श्वास घेत रहा… हिंमत हरू नका! मी पाचच मिनिटांत तुमच्यापर्यंत पोहोचेन… आणि एकदा का माझा तुम्हांला स्पर्श झाला… की मृत्यू तुमच्या जवळपासही येणार नाही… यह जबान है मेरी!”
13, Jammu And Kashmir Rifles चे Regimental Medical Officer Captain डॉक्टर आढाव साहेब जवानांशी, अधिका-यांशी बोलत होते…. वर्ष होते १९९९.
पाकिस्तानने कारगिल पर्वतावरील भारताच्या सैन्यचौक्या घुसखोरी करून ताब्यात घेतल्या होत्या. घुसखोरांच्या वेशात आलेल्या पाकिस्तानी नियमित सैन्याला तेथून हुसकावून लावणे अनिवार्य ठरले होते. अन्यथा भारत मोठ्या संकटात सापडला असता. त्यासाठी 13, Jammu And Kashmir Rifles चे जवान आणि अधिकारी मोहिमेवर निघाले होते.
Commanding Officer आणि त्यावेळी लेफ्टनंट कर्नल असलेल्या श्री. योगेश कुमार जोशी साहेबांनी उपस्थित सर्वांना परिस्थितीचे गांभीर्य मोठ्या आवेशात लक्षात आणून दिले…. इतिहास के पन्नोपर अपना नाम सोने के अक्षरों में दर्ज कराने का ऐसा मौका न जाने फिर कब मिलेगा? साहेबांनी विचारले! कुणालाही तो मौका गमवायचा नव्हता. मर्दमुकी गाजवायला उत्सुक शेकडो हृदये सज्ज होती…. एकमुखाने जयजयकार झाला… दुर्गा माता की जय!
“किसी को कुछ कहना है?” जोशी साहेबांनी प्रश्न केला. कुणाचा काहीही प्रश्न नव्हता! पण त्या गर्दीतून एक हात वर झाला. “बोलिये, डॉक्टर साहब!” साहेबांनी Regimental Medical Officer Captain डॉक्टर आढाव यांना प्रश्न केला. डॉक्टर साहेब एक वर्षभरापासून या सैन्याचे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांचा प्रश्न साधारण असा होता…. सैन्य प्रचंड उंचीवर लढाई करणार.. अर्थात काहीजण जखमी होणार… त्यांना खाली आणेपर्यंत खूप वेळ जाणार…. त्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण साहजिकच अधिक असणार… अशावेळी डॉक्टर सैनिकांच्या सोबत असला पाहिजे!
जोशी साहेब विचारात पडले…. तोपर्यंत सैन्यासोबत डॉक्टर थेट पहिल्या फळीत जाण्याची पद्धत नव्हती. वैद्यकीय पथक साधारणत: तिस-या फळीत राहून त्यांच्याकडे आणल्या जाणा-या जखमीवर उपचार करीत असते. आणि हे डॉक्टर साहेब तर त्या उंचीवर मी सैन्यासोबत येतो असे म्हणताहेत! ही मागणीच जगावेगळी होती. जोशी साहेबांनी परवानगी दिली!
दुस-या दिवशी पहाटे साडेचार वाजता जोशी साहेब आणि डॉक्टरसाहेबांनी पर्वत चढायला आरंभ केला. दिवसभर चालून चालून डॉक्टरसाहेब थकून गेले होते. सायंकाळचे साडे पाच सहा वाजले असावेत. शेवटी सैनिक, अधिकारी आणि डॉक्टर यांच्या शारीरिक क्षमतेमध्ये काही फरक तर असणारच!
तिथल्या एका मोठ्या खडकावर डॉक्टर साहेबांनी बैठक मारली… म्हणाले.. ”साहब… मैं बडा थक गया हूं.. अब इसके आगे नहीं चल सकता!”
यावर साहेब म्हणाले, ”ऐसा नहीं हो सकता. अब बस कुछ सौ मीटर्सही तो चढना है और रात भर रुकना है! मैं आपको ऐसे अकेले छोड के आगे नहीं जा सकता… और ना ही आपको पीछे भेज सकता हूं… !” यावर डॉक्टर साहेब नाईलाजाने उठले… काही पावले चालले असतील… एवढ्यात शत्रूने डागलेला एक बॉम्बगोळा डॉक्टर साहेब ज्या खडकावर बसले होते त्या खडकावर आदळला! मृत्यू डॉक्टर साहेबांच्या अगदी अंगणात येऊन गेला होता! ज्या अर्थी दैवाने आपला जीव वाचवला त्या अर्थी आपल्या हातून पुढे काही मोठे काम होणार आहे… अशी खूणगाठ डॉक्टर साहेबांनी मनाशी बांधली.. आणि ते निर्धाराने पर्वत चढू लागले.
एक दोन दिवसांत एक मोठा हल्ला करून एक शिखर ताब्यात घेण्याचे घाटत होते. त्यासाठी पाहणी करण्यासाठी एक पथक पुढे गेले होते. शत्रू वरून सर्व काही स्पष्ट पाहू शकत होता.. अचूक नेम धरून फायर करीत होता. त्यामुळे दिवसा काहीही हालचाल करणे धोक्याचे होते. म्हणून पाहणी पथक एका आडोशाला लपून छपून पाहणी करीत होते. काही अंतर अलीकडे डॉक्टर साहेब आपल्या साहाय्यकासह थांबलेले होते. एका मोठ्या खडकाआड त्यांनी आपले युद्धाभूमीवरचे इस्पितळ उभारले होते… जे काही उपलब्ध होते त्या साधनांच्या साहाय्याने. त्यांच्यापासून साधारण १०० मीटर्स वर एक खोल नाला होता. तिथे बसलेल्या आपल्या एका जवानाच्या मांडीत शत्रूने फायर केलेली एक गोळी खडकावर आपटून उलट फिरून घुसली होती… आणि तिथून ती पोटाच्या आरपार गेली होती. त्याचा रक्तस्राव त्वरीत थांबवणे गरजेचे होते. त्या सर्च पार्टीकडून डॉक्टरसाहेबांना संदेश आला…. ”किसीको गोली लगी है!
आडोसा सोडून त्या नाल्यापर्यंत पोहोचायचे म्हणजे पाकिस्तानी गोळीबाराच्या पावसातून पळत जावे लागणार होते. डॉक्टर साहेब त्यांच्या साहाय्यकाला, Battle Nursing Assistant शिवा यांना म्हणाले.. ”शिवा, क्या करें? तो म्हणाला, ”साब, आपने तो कह रखा हुआ है… पांच मिनट में पहुंचुंगा.. अब जाना तो है ही!” मग दोघे तयार झाले… ते ऐंशी ते शंभर मीटर्स अंतर धावत पार करण्याचे ठरले… हातात मेडिकल कीट घेऊन! आपले सैन्य कवर फायर देणार होते…. म्हणजे पाक्सितानी सैन्याचे लक्ष थोडेसे विचलीत होईल.
बर्फात तयार झालेल्या पायावाटेवरून सरळ पळत गेले तर वरून पाकिस्तानी अचूक नेम साधणार…. मग…. नागमोडी पळायचे ठरले… आणि दोघेही तसेच धावत सुटले… आपल्या सैन्याच्या गोळ्या सुसाट वेगाने या दोघांच्या डोक्यांवरून वर फायर केल्या जात होत्या.. आणि वरून पाकिस्तानी फायर येत होता…. एक गोळी पुरेशी ठरली असती…. पण निम्मे अंतर पार झाले तरी दोघे सुरक्षित होते… साहाय्यक नाल्यापर्यंत पोहोचला…. एवढ्यात त्याच्या मागोमाग धावणारे डॉक्टर साहेब खाली कोसळले… पायांत अडीच अडीच किलोचे बर्फात वापरायचे बूट असताना पळणे सोपे नव्हते… वाटले… आता डॉक्टर दगावले…. पण त्यांना गोळी लागली नव्हती. बुटाची लेस सुटली होती… त्यामुळे ते खाली कोसळले होते…. भारताच्या बाजूने सुरु असलेला कवर फायर थांबवण्यात आला… शत्रूला वाटले… लक्ष्य टिपले गेले.. त्यांनीही फायर थांबवला… एवढ्यात डॉक्टर साहेबांनी निर्धार केला.. एका हाताने बुटाची लेस अगदी घट्ट ओढून तशीच बुटाला गुंडाळली… उठले… आणि वायुवेगाने धावत सुटले…. आणि त्या नाल्यात पोहचले… सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला…. नाल्यात जखमी झालेला जवान डॉक्टर साहेबांच्या त्वरीत उपचाराने बचावला!
अगदी चार दोन दिवसांत मृत्यूने डॉक्टर साहेबांना दिलेली ही दुसरी धावती भेट होती… आता तर डॉक्टरसाहेबांच्या काळजातून भीती हा शब्द कायमचा निघून गेला.
त्या वेळी डॉक्टर साहेब अविवाहित होते. घरी आई-वडील होते. एका जवानाने विचारले… ”साहेब, असे धाडस करताना तुम्हांला आई-वडिलांची चिंता नाही का वाटत?” त्यावर त्यांनी उत्तर दिले… ”आई-वडील तर देव असतात… आपण देवाची चिंता करतो का कधी?”
या लढाईत डॉक्टर साहेबांना अनेक शूर वीरांचा सहवास लाभला… त्यांत सर्वांत संस्मरणीय होते ते Captain विक्रम बात्रा साहेब… शेरशहा! डेअरडेविल… एकदम नीडर, हसतमुख. त्यांना प्रत्येक मोहिमेमध्ये सहभागी व्हायला हवे असायचे. आणि ती मोहीम झाल्यावर ‘यह दिल मांगे मोअर’ म्हणत शत्रूवर तुटून पडायला हा सिंह तयार!
मोहिमेवर जाण्याआधी या काही अधिकारी-जवानां सोबत एकत्रित छायाचित्र काढले गेले होते… यातील कोण परतेल… कोण परतणार नाही… अशीही चर्चा हास्यविनोद म्हणून झाली होती. यावर डॉक्टर साहेब म्हणाले होते… ”हम सभी सहीसलामत वापस आयेंगे… और यहीपर फिर एक फोटो लेंगे!” पण या वाक्यातील सत्यता सर्वजण जाणून होते… लढाई होती ती.. खेळ नव्हे!
दुर्दैवाने यांमधील काही जण परतले नाहीत… त्यात शेरशहा होते !
☆ “विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, आणि विज्ञानाचे मर्म…” ☆ श्री जगदीश काबरे ☆
सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर १९८७ साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांनी ज्या विविध योजना सुरू केल्या त्यातील एक योजना म्हणजे देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणे.
राष्ट्रीय विज्ञान दिनासाठी कोणती तारीख निवडावी यासाठी तेव्हा खूप मोठा खल झाला. २ ऑक्टोबर ही गांधी जयंती घ्यावी की १४ नोव्हेंबर ही नेहरू जयंती घ्यावी असा एकूण चर्चेचा सूर असताना एकदम डॉ. वसंतराव गोवारीकरांच्या मनात आले की, अरे! हा तर राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी दिवस शोधायचा आहे आणि भारतात विज्ञानाचा पहिला नोबेल पुरस्कार डॉ. सी. व्ही. रामन यांना मिळाला आहे, तर त्यांच्याशी संबंधितच तो दिवस असावा. शिवाय तो त्यांचा जन्म अथवा मृत्युदिन निवडण्यापेक्षा त्यांनी ज्या दिवशी त्यांचा निबंध जगप्रसिद्ध ‘नेचर’ या विज्ञान मासिकात प्रसिद्ध झाला आणि ज्याला पुढे १९३० साली नोबेल पुरस्कार मिळाला ती तारीख का निवडू नये? अखेर ती तारीख निघाली २८ फेब्रुवारी मग तीच मुक्ररर झाली. तोच आज आपण साजरा करत असतो, तो हा राष्ट्रीय विज्ञान दिन.
विज्ञान म्हणजे काय?
एक क्षण डोळे बंद करा आणि मनात म्हणा- विज्ञान, वैज्ञानिक. तुमच्या डोळ्यांपुढे कसल्या प्रतिमा येतात? चकाचक प्रयोगशाळा व तिथली मोठमोठी उपकरणे, चंबूपात्रात उकळणारे रंगीत द्रावण, आकडय़ांची गिचमिड, पृथ्वीभोवती गरगरणारे तारे, ग्रह, धुमाकेतू, आकाशात होणारी ग्रहणे, फ्रिज, टीव्ही, मोबाईल फोनसारखी दररोजच्या वापरातील अत्याधुनिक उपकरणे, पांढऱ्या कोटातले रुबाबदार किंवा आपल्याच विचारात गर्क असणारे वेंधळे दिसणारे शास्त्रज्ञ… आणि मनात कुठले शब्द येतात? न्यूटन, आइनस्टाइन, निरीक्षण, प्रयोग, सिद्धांत, प्रमेय. हे सारे आपापल्या जागी बरोबर आहे; पण विज्ञान याच्यापलीकडेही आहे. विज्ञान काय आहे हे थोडक्यात सांगायचे झाल्यास तर—
१. विज्ञान हा परस्परसुसंगत आणि प्रतिक्षणी वाढणारा वैश्विक ज्ञानाचा संचय आहे आणि ती ज्ञानसंपादनाची एक पद्धतही आहे.
२. विज्ञान हा सृष्टीतील रहस्यांचा शोध घेण्याचा व तिच्यातील विविध घटना, प्रक्रिया यांचा अर्थ लावण्याचा एक मार्ग आहे.
३. सृष्टीतील रहस्य उलगडणे म्हणजे सत्याचा शोध घेणे. विज्ञान घेत असलेला सत्याचा शोध हा निरंतर आहे. म्हणजेच ‘काल’चे सत्य हे आजच्या नव्या ज्ञानाच्या निकषावर जुने ठरू शकते व त्याची जागा ‘आज’चे सत्य घेते. अर्थात त्यामुळे कालचे सत्य हे असत्य ठरत नाही, तर सत्याचे एक पाऊल पुढे पडलेले असते. अशाप्रकारे विज्ञान हे निरंतर सत्याचा शोध घेत असते.
४. विज्ञानाने शोधलेले सत्य हे व्यक्ती, स्थळ, काळ, परिस्थिती-निरपेक्ष असते. ते कोणालाही कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही काळात योग्य ती साधने वापरून तपासून पाहता येते, त्याची प्रचीती घेता येते.
५. सृष्टीची रहस्ये उलगडण्याचा, विसंगतीत सुसंगती शोधण्याचा हा ‘खेळ’ मोठा मजेदार व रोमांचकारक आहे. म्हणूनच शेकडो शतकांपासून लाखो-करोडो माणसे त्याचा ध्यास घेत आली आहेत, त्यात आपले योगदान देऊन विज्ञानाला आणि स्वत:लाही समृद्ध करत आली आहेत. हा ‘खेळ’ तो खेळणाऱ्यांसाठी जसा ‘धमाल’ आहे, तसाच समस्त मानवजातीसाठी उपयोगीही आहे.
वैज्ञानिक पद्धत कशी असते?
काय आहे ही पद्धत? सर्वात आधी आपल्याला नेमका काय प्रश्न पडला आहे, हे निश्चित करणे, म्हणजेच आपल्या शोधाचे गंतव्यस्थान निश्चित करणे. नंतर त्याकडे जाण्याचा आरंभिबदू म्हणजे गृहीतक ठरविणे. त्यानंतर या दोन बिंदूंना सांधणारा रस्ता… प्रयोग, निरीक्षण, निष्कर्ष यांच्या साखळीतून शोधणे. येणारे निष्कर्ष चुकीचे असतील तर आपले गृहीतक व संशोधन पद्धत परत परत तपासून पहात पुन्हा नव्याने सुरुवात करणे. आपले गृहीतक चुकीचे आहे हे सिद्ध करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करणे. जर अनेक प्रयोगांनी चुकीचे ठरले नाही तरच ते गृहीतक स्वीकारणे आणि वैज्ञानिक सिद्धांत तयार करणे. ही पद्धत कोणाही व्यक्तीला शिकता येऊ शकते. तिच्या मदतीने आपल्याला पडणारे प्रश्न कोणालाही सोडविता येतात. मात्र तटस्थ वृत्तीने निरीक्षण करणे ही त्यातली पूर्वअट आहे. प्रयोगाच्या विषयाचा जर आपण अलिप्तपणे विचार केला नाही, तर जे घडत आहे त्याचे निरीक्षण किंवा मोजणी अचूकपणे करणे आपल्याला शक्य होणार नाही. त्यातून मग छद्मविज्ञानाची निर्मिती होईल. छद्मविज्ञानात आपण निष्कर्षाला पूरक असे प्रयोग करत जातो. त्यामुळे विज्ञानाची हानी तर होते पण लोकांमध्ये अंधश्रद्धाही बळावतात.
विज्ञानाने शोधून काढलेल्या तत्त्वांचे उपयोजन मानवी जीवनातील काबाडकष्ट कमी करण्यासाठी, ते अधिक सुखकर व समृद्ध बनविण्यासाठी केले जाऊ शकते. त्यालाच आपण ‘तंत्रज्ञान’ म्हणतो. या वैज्ञानिक तत्वांची आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या तंत्रज्ञानाची निर्मिती प्रत्येक क्षणी पृथ्वीवरील लाखो व्यक्तींद्वारे होत असते. त्यातील कोणताही तुकडा सुटा नसतो, तर तो इतर तुकडय़ांशी, विश्वातील एकूण विज्ञानसमुच्चयाशी जुळलेला असतो. त्यामुळे ज्ञानाचा हा एकत्रित साठा निरंतर वाढत असतो. म्हणूनच ज्ञानाच्या या भांडारावर साऱ्या जगाची मालकी असते… असायला हवी. विज्ञानाचा मूळ उद्देश हा सृष्टीची रहस्ये उलगडणे, त्याद्वारे सत्याचा शोध घेणे हा आहे. आपल्या शरीरात, मनात, आसमंतात, त्यापलीकडे जे काही घडते ते तसे का घडते, त्याचा अर्थ शोधणे, इतर घटना, प्रक्रिया यांच्याशी त्याचे नाते शोधणे याचेच नाव विज्ञान. आणि ते सत्य शोधून काढण्याच्या पद्धतीचे नाव वैज्ञानिक पद्धत.
खऱ्या वैज्ञानिक पद्धतीमुळेच आपल्याला विश्वाच्या उत्पत्तीचे रहस्य उलगडले आहे. स्टीफन हॉकिंग या शास्त्रज्ञाचे नाव आपण ऐकले असेलच. त्यांनी केलेल्या निरीक्षण प्रयोगांद्वारे हे सिद्ध केले आहे की, हे विश्व भौतिक आणि रासायनिक नियमांनी बद्ध असल्यामुळे या विश्वाच्या उत्पत्तीपासून आजपर्यंतच्या सगळ्या घटना आणि यापुढे भविष्यात घडणाऱ्या सगळ्या घटनाही भौतिक आणि रासायनिक प्रक्रियांचा परिपाक आहेत आणि असणार आहेत. म्हणूनच या विश्वाचा कोणी निर्माता नाही. हे विश्व भौतिक-रासायनिक नियमांनी बद्ध असल्यामुळे स्वयंभू आहे. या घटना विविध पातळीवर निरंतर घडत राहत असतात आणि म्हणूनच विज्ञानसुद्धा निरंतर असते.
थोडक्यात काय तर, विज्ञान ही एक सत्याचा शोध घेण्याची पध्दत वा प्रक्रिया आहे. वैज्ञानिक सत्य हे सर्वांनाच एकसारखे लागू पडते. अमुक एक ह्या धर्माचा, ह्या वर्णाचा, गटाचा, पंथाचा, म्हणून त्याच्यासाठी हे वैज्ञानिक सत्य, तमुक एक त्या धर्माचा, वर्णाचा, पंथाचा म्हणून त्याच्यासाठी वेगळे वैज्ञानिक सत्य हे असे घडत नसते. म्हणून विज्ञानाने शोधलेले सत्य हे कोणीही नाकारू शकत नाही. विज्ञानाची सत्ये सर्वकालीक असून जगभर सर्वांना सारखीच लागू पडतात. तसेच ती सर्वमान्य असतात. कारण ते कोणालाही पडताळून पाहता येते. म्हणून आपण आपले जगणे, राहणे, वावरणे या वैज्ञानिक सत्याच्या प्रकाशातच पारखून घ्यायला पाहिजे. आपले जीवन वैज्ञानिक सत्याशी सुसंगत ठेवले पाहिजे. म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनाने जगण्याची सवय अंगी बाळगली पाहिजे.
वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय?
कुठल्याही घटितामागचा कार्यकारणभाव समजून घेणे किंवा दोन घटनांमधील परस्परसंबंध तपासून पाहणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोण. अशी एकदम साधी-सोपी व्याख्या करता येईल. किंवा असंही म्हणता येईल की, जेवढा पुरावा उपलब्ध आहे तेवढाच विश्वास ठेवणे. एखादी गोष्ट सत्य आहे का नाही यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोण”निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि प्रयोग.” या मार्गांनी ज्ञान आत्मसात करण्याची विज्ञानाची ही पद्धत आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे आपली दृष्टी कशी प्रगल्भ होते हे समजण्यासाठी काही उदाहरणे पाहूया…
वैज्ञानिक दृष्टिकोन शब्दप्रामाण्य म्हणजे कुणी एका मोठ्या व्यक्तीने सांगितले म्हणून खरे मानायचे, हे नाकारतो. वैज्ञानिक दृष्टिकोन ग्रन्थप्रामाण्य म्हणजे कुणाच्या तरी पुस्तकात लिहलंय म्हणून ते चिकित्सा न करता स्वीकारणे नाकरतो. वैज्ञानिक दृष्टिकोन हे चमत्काराचा दावा करणाऱ्या लोकांना मूर्खात काढण्याचं प्रभावी साधन आहे. कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही. चमत्कार करणारे बदमाश असतात, त्यावर विश्वास ठेवणारे मुर्ख असतात आणि याला विरोध न करणारे भ्याड असतात. चमत्करामागे हातचलाखी वा विज्ञान यापैकी काहीतरी एक असते. जगात सुष्ट शक्तिमुळे चांगले आणि दुष्ट शक्तिमुळे वाईट घडते असे अजिबात होत नाही. जे काही घडते त्यामागे निश्चितच कारण असते, आणि ते वैज्ञानिक दृष्टिकोनाच्याच आधारे शोधता येते.
विज्ञानाचे मर्म काय —
– – तेव्हा विज्ञानाचे मर्म ओळखण्यासाठी लक्षात ठेवा…
☆ एक होतं गाव…. “महाराष्ट्र ” त्याचं नाव – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित☆
एक होतं गाव…. “महाराष्ट्र ” त्याचं नाव.
– – गाव खूप छान होतं, लोक खूप चांगले होते. “मराठी” भाषा बोलत होते, गुण्यागोविंदानं नांदत होते.
त्यांचं मन खूप मोठ्ठं होतं. वृत्ती खूप दयाळू होती. दुखलं- खुपलं तर एकमेकांच्या हाकेसरशी धावून जायचे.
आल्यागेल्याला सांभाळून घ्यायचे. एकमेकांना साथ देऊन जगण्याचं गाणं शिकवायचे..
महाराष्ट्रात होता एक भाग… “मुंबई” त्याचं नाव…
मुंबईसुद्धा छान होती; महाराष्ट्राची शान होती. सर्वांच्या आकर्षणाची बाब होती. आजूबाजूचे सगळेच मुंबईसाठी धडपडत होते. इथं आले की इथलेच होऊन राहत होते.
“अतिथी देवो भव… !” या उक्तीनुसार महाराष्ट्रातील लोकांनी सर्वांचं आदरातिथ्य केलं. पाहुण्यांचा मान म्हणून मागतील ते देऊ लागले.
हळूहळू परिस्थिती बदलू लागली.
“अतिथी” जास्त आणि “यजमान” कमी झाले.
मुंबई कमी पडू लागली, आजूबाजूला पसरू लागली.
सगळ्यांचीच भाषा वेगवेगळी होती. – – मराठी आपली वाटत नव्हती.
प्रश्न मोठा गहन होता, पण माणसं मात्र हुशार होती, दूरदृष्टीची होती.
त्यांना एक युक्ती सुचली… दूरदेशीची परदेशातील भाषा त्यांना जवळची वाटली.
त्यांना वाटलं आपली मुलं शिकतील, परदेशात जातील, उच्चशिक्षित होतील.
सर्वांचाच, अगदी “महाराष्ट्राचा” ही विकास होईल,
म्हणून त्यांनी याच भाषेतील शिक्षणाची सोय केली.
आजूबाजूला या भाषेत बोलणारे पाहून मराठी माणसंही खंतावली.
आपल्यालाही हे आलंच पाहिजे म्हणून याच भाषेत शिकू लागली, शिकवू लागली.
…. मग हळूहळू मराठी कोणीच शिकेना.. मराठी कोणीच बोलेना.. बोलीभाषा ही बदलली.
सगळ्याचा नुसता काला झाला… शुद्ध सुंदर मराठीचा लोप झाला.
अशा या महाराष्ट्रातील एक छोटा मुलगा आपल्या आईबरोबर.. माफ करा हं… आपल्या ‘मम्मी’ बरोबर एकदा वाचनालयात गेला. चुकून त्याचा हात पुस्तकावर पडला. त्यानं ते उघडलं…..
…. पुस्तक शहारलं, पानं फडफडली, आनंदित झाली.
त्यांना वाटलं निदान आज तरी आपल्याला कोणी वाचेल.
इतक्यात त्या मुलानं विचारलं,
“Which language is this? “
‘मम्मी’ खूप सजग होती, मुलाचं हित जाणत होती, सगळं ज्ञान पुरवत होती.
पुस्तक जागेवर ठेवत म्हणाली,
“अरे, खूप पूर्वी म्हणजे तुझ्या आजोबांच्या वेळेस “मराठी भाषा” प्रचलित होती;
आता कोणी नाही ती बोलत. ”
पुस्तक कोमेजलं, पानं आक्रसली, पानांपानांतून अश्रू ठिबकले; पण – –
हळहळ वाटण्याचं काही कारण नव्हतं… कारण आता मराठीसाठी दुःखी होणारं काळीज कोणाचंच उरलं नव्हतं!
महाराष्ट्राची शान “मराठी” भाषा!
मला एकाने विचारले “ तू मराठीत का ‘पोस्ट’ टाकतोस? “
आणि, मी त्यांना एवढंच म्हटलं – –
– – “ आमच्या घरात “तुळस”आहे, ‘Money plant’नाही.
आमच्या स्त्रिया “मंदिरात” जातात, ‘PUB’ मध्ये नाही.
आम्ही मोठ्यांच्या पायाच पडतो, त्यांच्या गळ्याला मिठी मारत नाही.
आम्ही “मराठी” आहोत, आणि मराठीच राहणार !
तुम्ही English मध्ये मेसेज केलात तरी मी रिप्लाय मराठीतूनच देतो,
याचा अर्थ असा नाही की, मला English येत नाही. ”
अरे गर्व बाळगा तुम्ही – – मराठी असल्याचा.
“काकी” ची जागा आता ‘Aunti’ घेते
‘वडील’ जिवंतपणीच “डेड” झालेत.
“भाऊ” ‘Bro’ झाला… !!
आणि “बहीण ” ‘Sis’… !!!
दुध पाजणारी “आई” जिवंतपणीच ‘Mummy’ झाली.
घरची “भाकर” आता कशी आवडणार हो.. ५ रु. ची ‘Maggi’ आता किती “Yummy” झाली.
मराठी माणूसच “मराठी” ला विसरू लागलाय…. आपली संस्कृती लोप पावण्यापुर्वी ती जपण्याचा निदान प्रयत्न तरी करावा…
*आजपासूनच शक्यतोवर मराठी लिहिण्याचा प्रयत्न करूया. *
आज २७ फेब्रुवारी.. आज मराठी भाषा दिवस आहे.
┉❀꧁꧂❀┉
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सांगलीतले तरुण भारत स्टेडीयम. श्रोत्यांची तुडुंब गर्दी. आज एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल पाच मंगेशकर गाणार होते! लता, आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ मंगेशकर.
मंचावर जणू आकाशगंगाच अवतरली होती… त्यात लतादीदी धृवपदी विराजमान. साधी माणसं या चित्रपटासाठी गाणं लिहिलं होतं… जगदीश खेबुडकर या भारी माणसाने आणि संगीत दिले होते.. आनंदघन अर्थात खुद्द लता मंगेशकर यांनी.
म्युझिक अरेंजरने इशारा केला… वन. टू… थ्री…. स्टार्ट ! गाण्याचा प्रारंभच मुळी होता एक हलक्याशा तालवाद्याच्या ठेक्याने…. त्या तालवादकाने धडधडत्या काळजाने आणि थरथरत्या हाताने आपले ते नाजूक वाद्य स्वामी समर्थांचे स्मरण करून छेडले…. अचूक… अगदी अचूक ! आज त्याने चूक करून चालणारच नव्हतं…. दिदींनी ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे हे शब्द उच्चारले आणि संपूर्ण श्रोतृवृंद अक्षरश: मोहरून गेला! गाणं ज्या तालवाद्याने सुरु झाले होते.. त्याच वाद्याच्या तालात अगदी नाजूक पावलांनी चालून थबकले…. अर्थात टाळ्यांचा कडकडाट झालाच! दीदीने मग राजाच्या रंग म्हाली सुरु केले आणि मग या राजाची भीड चेपली गेली!… हा वादक होता…. राजू! अर्थात सोमनाथ रघुनाथ साळुंके. पुण्यातून सांगलीत या कार्यक्रमासाठी राजू जावळकर, रमाकांत परांजपे हे वादकही गेले होते आणि त्यांनी या वादकाला सोबत नेले होते…. मंगेशकरांचा वाद्यवृंद या राजूसाठी अगदी नवखा होता!
सोमनाथ यांचा जन्म एरंडवण्यातल्या गणेशनगर वस्तीत तेरा जानेवारी चौसष्ट रोजीचा! वडील त्यांच्या तारुण्यात गोवा मुक्ती लढ्यातील एक स्वातंत्र्य सैनिक. पुढे पोटासाठी त्यांनी दैनिक केसरीमध्ये कंपोझर म्हणून नोकरी केली. परंतु आधुनिक छपाई यंत्रे आली आणि हे खिळे जुळवणारे कालबाह्य झाले. मग रघुनाथराव ऑटो रिक्षा चालवून कुटुंबाचा चरितार्थ चालवू लागले. खाणारी तोंडे आणि येणारे रुपये… मेळ बसणे शक्य नव्हते. सोमनाथ यांचे मोठे बंधू सुद्धा याच व्यवसायात आले कारण पर्याय नव्हता. धाकट्या सोमनाथला शिकावेसे वाटत होते.
मनपा ५५ नंबर १ली ते ४थी. पाचवी ते सातवी ३० नंबर. आठवी नववी नारायण पेठेतील वेलणकर हायस्कूलमध्ये. आणि हॉटेलचा कचरा टाकणे, पाण्याच्या टाक्या साफ करून देणे, water प्रूफिंगची कामे करून देणे, सायकलवर फिरून वर्तमानपत्रे घरोघरी पोहोचवणे ही आणि अशी कित्येक किरकोळ कामे करून दहावीचा अभ्यास करण्यासाठी आपटे प्रशाला नाईट स्कूलमध्ये जाणे असा क्रम सुरु झाला.
हे जीवनचक्र सुरु असताना सायकलच्या दोन चाकांनी भुरळ घातली. आणि सोमनाथची स्वप्नं वेगाने धाव घेऊ लागली. श्रीगोंदेकर नावाच्या मित्राची एक साधी सायकल मिळाली… तिच्यात modification करून तिची रेसिंग सायकल बनवली Roadster! आणि मग स्थानिक सायकल स्पर्धांमध्ये सहभाग घ्यायला आरंभ केला….. जिंकण्याची चटक लागली ती इथूनच.
त्या काळी पुण्या-मुंबईमध्ये सायकल रेसचे वेड होते. खंडाळा घाट वेगात पार करणा-याला घाटांचा राजा किताब मिळायचा. आधुनिक सायकलवाले हा घाट चोवीस मिनिटांत चढायचे आणि आपला हा राजा जुनी सायकल दामटत त्यांच्या मागोमाग पोहोचायचा… केवळ चार मिनिटांचा फरक असायचा! नंतर पै-पै जमवून सोमनाथ यांनी ४६००० हजार रुपयांची रेसर सायकल विकत घेतली.
या खेळात पैसा मात्र फारसा नव्हता! कित्येक स्थानिक स्पर्धांमध्ये सोमनाथ यांनी कप्स, ढाली मिळवल्या. इतक्या की घरात ठेवायला जागा पुरेना. लाकडी ढाली तर सोमनाथ यांच्या मातोश्रींनी चक्क बंबात घालायला वापरल्या!
सायकल रेसिंग मध्ये सोमनाथ यांनी एकदा नव्हे दोनदा राष्ट्रीय मजल मारली. प्रॉमिस कंपनीने १५ जानेवारी ते २० जानेवारी १९८९ या कालावधीत मुंबई ते गोवा अशी ६८० किलोमीटर्स अंतराची पाच दिवसांची सायकल रेस आयोजित केली होती. पूर्ण देशभरातले सायकलपटू सहभागी होते. आपले सोमनाथ त्यांच्या त्या सायकलवर स्वार झाले आणि त्यांनी तिस-या क्रमांकाने गोवा गाठले…. ५७ तास, ५७ मिनिटे आणि ५८ सेकंदात! गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांच्या हस्ते सोमनाथ यांनी पारितोषिक स्वीकारले…. वडिलांनी गोवा मुक्ती आंदोलनात घेतलेल्या सक्रीय सहभागाला जणू ही आदरांजली म्हणावी!
प्रॉमिस कंपनीच्या स्पर्धेतले हे यश प्रॉमिसिंग सोमनाथ यांना चांगल्या नोकरीचे प्रॉमिस मात्र देऊ शकले नाही. पोलिस खाते, बँक्स, शासकीय सेवा यांना सोमनाथ यांचे कर्तृत्व दिसले नाही. मग सोमनाथ यांनी सायकल एका कोप-यात ठेवून दिली!
पण सोमनाथ यांनी आणखी एक छंद जोपासला होता… वाद्य वादनाचा. जिथे कुठे वाद्य वाजवली जात तिथे सोमनाथ जात…. तिथल्या लोकांची काहीबाही कामे करून देत… आणि ते वाद्य कसे वाजवले जाते… त्याचे निरीक्षण करीत…. अशी सुमारे चाळीस वाद्ये सोमनाथ वाजवायला शिकले! मग लोक त्यांना वाद्ये वाजवायला बोलावू लागले.
मंगेशकरांच्या सांगलीतल्या कार्यक्रमासाठीही त्यांनाही असेच बोलावले गेले होते. पण त्या कार्यक्रमानंतर त्यांना पुढे काही विशेष काम मिळाले नाही.
अभिनव पूर्व प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन होते. त्यात काही वाद्ये वाजवायला कुणी तरी पाहिजे होते. सोमनाथ यांचे मोठे बंधू या शाळेची वर्दी करीत असत…. म्हणजे रिक्षा काका होते. शिरीष निर्मळ हे त्यावेळी तिथे नुकतेच सेवक म्हणून रुजू झाले होते. त्यांनी सोमनाथ यांच्या भावाकडे निरोप दिला आणि सोमनाथ यांचा अभिनव परिवारात वाजत गाजत प्रवेश झाला! इथे काही वर्षे सेवक म्हणून सेवा दिल्यानंतर सोमनाथ यांना आदर्श शिक्षण मंडळीच्या कार्यालयात नेमणूक मिळाली.
याच नोकरीच्या आधारे २७/१२/९४ रोजी सोमनाथ विवाहबद्ध झाले. आता कौटुंबिक जबाबदारी वाढली होती. दिवसा नोकरी आणि संध्याकाळी विविध कार्यक्रमांत ताल वाद्ये वाजवून सोमनाथ संसाराच्या ऐरणीला ठिणगी ठिणगीची फुले वाहत जमेल तसा भाता वरखाली करीत होते.
आणि एकेदिवशी ऐरण प्रसन्न झाली बहुदा. श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपती ट्रस्टने गणेश क्रीडा कला मंचावर मराठी गाण्यांचा कार्यक्रम आयोजला होता. पुण्यातील प्रसिद्ध हार्मोनियमवादक नरेंद्र चिपळूणकर यांनी सोमनाथ यांना या कार्यक्रमात संधी मिळवून दिली. उषाताई मंगेशकर होत्या गाण्यास. पंडित हृदयनाथ मंगेशकर प्रेक्षकात उपस्थित होते. त्यांनी सोमनाथ यांची कला ऐकली आणि त्या रात्री बारा वाजता सोमनाथ साळुंके यांना पंडितजीचा फोन आला… सर्व वाद्ये घेऊन उद्याच्या कार्यक्रमास हजर रहावे! उषाताईसोबत तर शनिवार वाड्यासमोर झालेल्या कार्यक्रमात एका गाण्यात साथही देण्याची संधी सोमनाथ यांना मिळाली होती. विशिष्ट ढंगाच्या आवाजामुळे आणि उत्तम पाठांतर असल्याने पल्लेदार वाक्ये सोमनाथ सहजी म्हणू शकत होते.
अशा गावात तमाशा बरा.. इशकाचा झरा…. पिचकारी भरा… उडू दे रंग.. उडू रंग… मखमली पडद्याच्या आत…. पुनवेची रात… चांदनी न्हात… होऊ दे दंग.. चटक चांदणी चतुर कामिनी… काय म्हणू तुला तू हाईस तरी कोण? छबीदार छबी.
पुढे अनुराधा पौडवाल यांच्या सोबत अनिल अरुण यांच्या रजनीगंधा कार्यक्रमात सोमनाथ यांची तालवाद्ये वाजली. डोंबिवली मध्ये आशा ताईनी मोठा कार्यक्रम केला.. त्यात सोमनाथ होते… ताईन्च्या घरी सराव करता करता आशा ताईने केलेला पुलाव चाखण्याची संधीही त्यांना लाभली.
उषाताई, आशाताई, हृदयनाथ, भारती मंगेशकर यांनी या प्रामाणिक सोमनाथला जीव लावला. जीवघेण्या आजारात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अगदी व्ही आय पी कक्षात उपचार दिले… तेही अगदी विनामूल्य. कलेची कदर करणारी ही माणसे म्हणूनच मोठी आहेत!
हाती लागेल ते वाद्य वाजवणे आणि मिळेल ते गाणे गाणे हा या जंटलमन राजूचा शिरस्ता. त्यातूनच आम्ही सातपुते चित्रपटात अशोक सराफ यांच्यासाठी पार्श्वगायन करण्याची संधी साधली… सोनू निगम, वैशाली सामंत यांच्यासोबत रुपेरी पडद्यावर नाव झळकले… राजेंद्र साळुंके! मित्र त्यांना राजा म्हणत त्यातूनच राजेंद्र नाव रूढ झाले.
अभिनव पूर्व प्राथमिक…. आदर्श शिक्षण मंडळी…. आदर्श मुलींचे हायस्कूल… कै. सौ. सुशीलाबाई वीरकर हायस्कूल… आणि शेवटी अभिनव हायस्कूल अशा नोकरीचा प्रवास करताना आपण मोठे कलाकार आहोत, शिपायाचे काम कसे करू असे प्रश्न सोमनाथ उर्फ राजूकाका यांना पडले नाहीत. रात्री कार्यक्रम करून यायला उशीर झाला तरी सकाळी कामावर शाळेत वेळेत हजर राहणे हे राजूच्या अंगवळणी पडले होते. कार्यक्रम या शब्दातील पहिले का आणि शेवटचे म हे अक्षर मिळून काम असा शब्द होतो!
शाळेच्या कार्याक्रमात हक्काचा तालवादक म्हणून सेवा बजावली… संबळ विशेष आवडीचा. त्यांच्या मुलानेही, धनंजयने बी. पी. एड. करून शैक्षणिक क्षेत्रात काम सुरु केले आहे. हा मुलगाही राजू काकांना ताल से ताल मिला करीत अनेक मोठ्या कलाकारांना वाद्य साथ करीत आहे….. तो सर्व वाद्ये वाजवतो.
सोमनाथ उर्फ राजू यांना आजवर अनेक पुरस्कार मिळालेत. स्वामी समर्थ कलाकार पुरस्कार, गंधर्व पुरस्कार आणि असे अनेक. सलग १२१ गाणी वाजवण्याचा त्यांचा विक्रम लिम्का बुक मध्ये नोंदला गेला आहे. ३१ जानेवारी, २०२५ रोजी राजू काका निवृत्त झाले. आजपर्यंत त्यांनी कित्येक प्रसिद्ध कलाकारांना साथ केली आहे. त्यात उषाताई मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, अरुण दाते, उत्तरा केळकर, रवींद्र साठे, अनुराधा पौडवाल, दयानंद घोटकर अशा अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. प्रा. नरेंद्र चिपळूणकर, राजू जावळकर, डॉक्टर राजेंद्र दूरकर, विवेक परांजपे, दयानंद घोटकर हे राजू यांचे मित्र, मार्गदर्शक!
अभिनव पूर्व प्राथमिक मराठी—आदर्श शिक्षण मंडळी कार्यालय—आदर्श मुलींचे विद्यालय—कै. सौ. सुशीलाबाई वीरकर विद्यालय आणि शेवटी तीन वर्षे अभिनव विद्यालय हायस्कूल, मराठी माध्यम, अशी त्यांची सेवा झाली !
कष्टाच्या ऐरणीवर श्रमाचे घाव घालीत सोमनाथ म्हणजे राजू काकांनी अनेकांची आभाळागत माया मिळवली आहे….. त्यांच्या आयुष्यात लक्ष्मीची चवरी वरखाली होत राहावी…. ही प्रार्थना !
‘६ सप्टेंबर हा दिवस पाकिस्तानचा संरक्षण दिवस ‘ म्हणून साजरा केला जातो. म्हणजे पाकिस्तानसाठी या दिवसाचं महत्व किती असेल याची कल्पना करा! आणि ते तसं होतंच!
कारण त्याच दिवशी संध्याकाळी पाकिस्तानने आपल्या पठाणकोट, आदमपूर आणि हलवारा या हवाईदलाच्या तीन तळांवर अकस्मात हल्ले केले होते. महत्वाची बाब म्हणजे तेव्हा अधिकृतपणे युद्ध सुरू झाल्याची घोषणा होणे बाकी होते! अर्थात ऑगस्ट महिन्यापासूनच सीमेवर चकमकी चालू होत्या. आपल्या छाम्ब क्षेत्रात पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात रणगाडे घुसविले होते. त्यामुळे छाम्ब क्षेत्रावर दबाव आला होता. हा दबाव कमी करण्यासाठी आपल्या हवाईदलाने ६ सप्टेंबरला सकाळी लाहोरवर बॉम्ब वर्षाव केला होता. त्याला फारसा विरोध झाला नव्हता, कदाचित म्हणून आपण थोडे बेसावध असू.
तर या तीन ठिकाणांपैकी आदमपूर आणि हलवारा या दोन तळांवर आपल्या हवाईदलाच्या गस्त आणि प्रखर प्रतिकारामुळे आलेली पाकिस्तानची विमाने फारसे नुकसान करू शकली नाहीत. मात्र पठाणकोटवर झालेला हल्ला एवढा अनपेक्षित आणि अकस्मात होता की आपल्या हवाईदलाला प्रतिकार करायलाही उसंत मिळाली नाही! तेथील तळावर असलेली आपली दहा विमाने जागेवरच नष्ट झाली!! पाकिस्तानच्या दृष्टीने हा विजय किती मोठा असेल याची आपण कल्पना करू शकतो!
त्या वेळची पाकिस्तान आणि भारताची विमानदलांची तौलनिक स्थिती काय होती.. तर आपल्याकडे नॅट, हंटर, व्हॅम्पायर्स, कॅनबेरा, माईस्टर्स, आणि मिग २१ अशी त्या काळी सुद्धा जवळपास कालबाह्य झालेली विमाने होती!! तर पाकिस्तानकडे होती एफ १०४ स्टार फायटर्स.. त्या काळची जगातील सर्वोत्तम फायटर् विमाने.. जी अमेरिकेने त्यांना जवळ जवळ फुकट दिली होती. त्या शिवाय एफ ८६ सॅबरजेट, बी ५७ कॅनबेरा बॉम्बर, एच ४३, एस ए १६, सी १३० अशी हवाई क्षेत्रातील सर्वात बलाढ्य आणि आपल्या विमानांच्या तुलनेत चौपट वेगवान विमाने!!
आपल्या वायुदलाला ही वस्तुस्थिती माहीत नव्हती काय?? नक्कीच माहीत होती. त्यांनी आपल्यापाशीही अशी वेगवान विमाने असावीत म्हणून तात्कालीन सरकारकडे शेकडो वेळा मागणी केली होती. पण आपल्या सरकारचे ‘शांती’ हे ब्रीदवाक्य होते. युद्ध या शब्दाचा त्यांना प्रचंड तिटकारा होता. त्यातच चीनकडून प्रचंड पराभव झाल्याने सरकारमधील श्रेष्ठी आधीच खचले होते. त्यात हवाईदलाची ही मागणी म्हणजे पुन्हा युद्ध.. आणि युद्ध करण्याच्या मानसिकतेत सरकार नव्हते. सबब आहे त्या तुटपुंज्या साधनांनी लढणे तिन्ही दलांना क्रमप्राप्त होते.. याची अपरिहार्य परिणती आपल्या सैन्याचे, वायुदल, नौदलाचे प्रचंड प्रमाणात नाहक शिरकाण होण्यात होणार, हे नक्की होते! सर्व सेनादलांचे प्रमुख यांना ही गोष्ट स्पष्ट दिसत होती.. पण प्राणपणाने लढणे एवढेच त्यांच्या हातात होते…!!
तर सहा तारखेच्या त्या जबरदस्त अपमानाचा बदला घेण्याचे त्याच रात्री ठरले. या वेळी नशीब म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र मान. यशवंतराव चव्हाणसाहेब हे केंद्रात संरक्षणमंत्री होते. त्यांनी तात्काळ प्रतिकाराचे आदेश दिले.
आता पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले जाणार हे नक्की होते. अर्थात पाकिस्तानला हे अपेक्षित असणार हे लक्षात घेऊन सीमेवरच्या हवाई तळांवर हल्ले न करता पाकच्या आत खोलवर.. जिथे एफ १०४ स्टार फायटर्सचा मुख्य तळ होता, त्या सरगोधा या अति महत्वाच्या तळावर घाव घालण्याचे नक्की झाले. या हल्ल्याची कमान आदमपूर येथील हवाई तळाने स्वीकारली.
आणि सात तारखेला पहाटे आपल्या आठ विमानांनी उड्डाण केले. सुरुवातीला बारा विमाने पाठविण्याचे ठरले होते, पण ऐन वेळी फक्त आठ विमाने या मोहिमेसाठी निवडली गेली. सूडाच्या आगीने धुमसत असलेल्या आपल्या आठही वैमानिकांनी प्रचंड त्वेषाने शक्य तेवढ्या वेगाने जात सरगोधा हवाईतळ गाठला. सर्व पाकिस्तानी तळ गाफील होता. पाकिस्तानच्या एवढ्या आत असलेल्या आणि अति वेगवान अशा बारा एफ १०४ स्टार फायटर्सचा तळ असलेल्या जागी आपल्या पठाणकोटवरच्या विजयी हल्ल्याच्या फक्त बारा तासांच्या आत भारतीय विमानदल धडक मारेल हे पाकिस्तानी विमानदलाच्या स्वप्नातही आले नसेल आणि रात्रीच्या विजयाच्या आनंदात युद्धातील विजयाचे स्वप्न पहाणाऱ्या त्या पाकी तळावर वीज कोसळावी, तसा आपल्या आदमपूर येथील वीर वैमानिकांनी भयानक हल्ला चढवला. त्यांची ११ – एफ १०४ स्टार फायटर्स विमाने उभ्या जागी अल्लाला प्यारी झाली. संपूर्ण तळ जवळपास नष्ट झाला. मात्र तशाही स्थितीत एक एफ १०४ स्टार फायटर आकाशात उडाले. तोपर्यंत आपली विमाने परतीच्या प्रवासाला लागली होती. पण एफ १०४ स्टार फायटरचा वेग एवढा प्रचंड होता की, त्याने आपल्या विमानांना जवळ जवळ गाठलेच.. त्या पाकी विमानात अत्याधुनिक मिसाईल्स होती. जर त्याला अडविले नसते तर आपल्या सर्व विमानांचा विनाश ठरलेला होता!!
पण अडवणार तरी कसे.. त्या विमानाचा वेग आपल्यापेक्षा चौपट.. शिवाय मिसाईल्स..
आणि अशा वेळी त्या विमानाला अंगावर घेतले ते आपल्या एका असामान्य शूर वीराने.. श्री. अजामदा बोपय्या देवय्या हे त्या शूर वैमानिकाचे नाव..
या असामान्य शूर वीराने आपले विमान सरळ त्या अजस्त्र एफ् १०४ स्टार फायटरच्या अंगावर घातले! सरळ समोरासमोर धडकवले! याची परिणती काय होणार, हे देवय्यांना पुरेपूर माहीत होते.. तरीही भारतमातेच्या या सुपुत्राने आपल्या हवाईदलासाठी अत्यन्त बहुमूल्य असलेल्या उरलेल्या सात विमानांसाठी आणि त्या पेक्षाही बहुमोल असलेल्या आपल्या वैमानिकांसाठी आपल्या प्राणाची या यज्ञात आहुती देण्याचे ठरविले होते. इतर कोणत्याही प्रकारे ते विमान पाडणे, त्या वेळी शक्य नव्हते.. आणि सरळ आपल्या अंगावर धावून येत असलेल्या या मृत्यूला पाहून त्या पाकी विमानाच्या वैमानिकाने पॅराशूटमधून सरळ खाली उडी मारली! स्क्वाड्रन लीडर देवय्या आपले विमान घेऊन सरळ त्या विमानावर वेगाने आदळले!! त्याही परिस्थितीत त्यांच्या चेहेऱ्यावर विजयाची स्मितरेषा नक्की चमकली असेल, याची मला पूर्ण खात्री आहे..
आपल्या परतलेल्या सातही वैमानिकांना युद्ध समाप्तीनंतर वीर चक्राने सन्मानित करण्यात आले. परंतु स्क्वाड्रन लीडर देवय्या यांचा काहीच ठाव ठिकाणा लागत नव्हता. त्यांना बहुधा अपघात होऊन त्यांचे विमान पाकिस्तानात पडले किंवा पाडले गेले असावे आणि त्यांना युद्धकैदी बनविले गेले असावे, असे भारतातील वायुदलाच्या क्षेत्रात समजले जात होते.
परंतु जवळपास बावीस वर्षांनी एका पुस्तकामुळे देवय्यांचा हा पराक्रम उजेडात आला. ब्रिटिश लेखक जॉन फ्रिकर यांना पाकिस्तानने १९६५च्या युद्धाचा अभ्यास करण्यासाठी बोलाविले, तेव्हा त्यांनी केलेल्या संशोधनात सत्य उलगडले. आपल्यामागून आपला पाठलाग होतोय आणि जर हा संभाव्य हल्ला आपण रोखला नाही तर आपला सर्वांचा विनाश आहे हे ओळखून ते मागे फिरले आणि त्यांनी ते अजस्त्र एफ १०४ स्टार फायटर अंगावर घेतले! याला विमानयुद्धाच्या भाषेत ‘बुल फाईट’ म्हणतात. आणि यात आपल्या चिरकूट विमानाने एफ १०४ पाडले.. हे प्रचंड आश्चर्य!! हा आश्चर्याचा धक्का हे विमान बनविणाऱ्या त्या लॉकहिड मार्टिन कंपनीलाही बसला. त्यांनी या घटनेचा समग्र अभ्यास केला आणि आपल्या विमानात नंतर सुधारणा केल्या!
स्क्वाड्रन लीडर देवय्या यांचा हा भीमपराक्रम समजायला आपल्याला बावीस वर्षे लागली. मात्र आपल्या सरकारने त्या नंतर त्यांना तेवीस वर्षानंतर ‘मरणोत्तर महावीर चक्र’ देऊन त्यांचा उचित सन्मान केला. महावीर चक्र हा युद्ध काळातील परमवीर चक्राच्या खालोखालचा सन्मान आहे!! देशाच्या इतिहासात मरणोत्तर महावीर चक्र प्राप्त करणारे एकमेव नाव आहे – –
– – स्क्वाड्रन लीडर देवय्या!!
ही आहे कहाणी स्क्वाड्रन लीडर देवय्या या शूर सैनिकाची! भारतमातेच्या या थोर सुपुत्राची.
आज ही कहाणी ज्ञात होण्याचे कारण म्हणजे श्री. अक्षयकुमार यांचा आजच पाहिलेला ‘स्काय फोर्स’ हा अप्रतिम चित्रपट.. संपूर्ण चित्रपटभर आपला ऊर अभिमानाने भरून येतो. तर कधी देवय्याजी आणि त्यांच्या सोबत्यांच्या कहाणीने डोळ्यांतून अखंड अश्रू वाहतात. त्या वेळच्या सैन्यदलांच्या अवस्थेने मन विषण्ण होते. आपल्या सरकारच्या बेफिकीरीमुळे आपल्या सैनिकांच्या निष्कारण होणाऱ्या मृत्यूंमुळे मन हळहळते..
तर मंडळी, एकदा चित्रपटगृहात जाऊन हा देशप्रेमाचा.. स्क्वाड्रन लीडर देवय्या या शूर सैनिकाची, भारतमातेच्या या थोर सुपुत्राची कहाणी सांगणारा हा चित्रपट जरूर पहा.. !!
लेखक : श्री सुनील कुळकर्णी
तळे, पुणे
लेखक : श्री विनीत वर्तक ( माहिती स्त्रोत :- गुगल, नासा )
प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈