कलमपुडी राव, वयाच्या साठाव्या वर्षी निवृत्त होऊन अमेरिकेत नातवंडांना सोबत मुलीकडे रहायला गेले. तिथे वयाच्या ६२ व्या वर्षी पिटसबर्ग विद्यापीठात संख्याशास्र विषयाचे प्राध्यापक तर वयाच्या ७० व्या वर्षी पेनसुलव्हाणीया विद्यापीठात विभाग प्रमुख. वयाच्या ७५ व्या वर्षी अमेरिकेचे नागरिकत्व. वयाच्या ८२ व्या वर्षी National Medal For Science हा व्हाईट हाऊस चा सन्मान.
आज वयाच्या १०२ व्या वर्षी संख्या शास्र (Statistics) विषयातील नोबेल पारितोषिक मिळालंय त्यांना.
भारतात सरकारने त्यांना पदम भूषण (१९६८) आणि पदम विभूषण (२००१) देऊन अगोदरच गौरविले आहे.
राव म्हणतात: “ भारतात सेवानिवृत्त झाल्यावर कोणी विचारीत नाही. अगदी शिपाई सुध्दा पदावर असेल तर नमस्कार करील. सहकारी देखील सत्तेचा आदर करतात, प्रज्ञेचा (scholarship) नाही.”
वयाच्या १०२ व्या वर्षी, उत्तम शरीर प्रकृती असताना नोबेल मिळणं हे बहुदा पहिलं उदाहरण असावे.
मानवी प्रज्ञेची दखल घ्यावी अशी घटना !
संग्राहिका : स्नेहलता गाडगीळ
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २३ – ऋचा १६ ते २४ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २३ (अप्सूक्त)
ऋषी – मेधातिथि कण्व
देवता – १६-२३ अप् (पाणी); २४ अग्नि;
ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील तेविसाव्या सूक्तात मेधातिथि कण्व या ऋषींनी अनेक देवतांना आवाहन केलेली असली तरी ती मुख्यतः जलदेवतेला उद्देशून हे अप् सूक्त सूक्त म्हणून ज्ञात आहे. यातील सोळा ते तेवीस या ऋचा अप् (पाणी) आणि चोविसावी ऋचा अग्नि यांचे आवाहन करतात. या सदरामध्ये आपण विविध देवतांना केलेल्या आवाहनानुसार गीत ऋग्वेद पाहूयात. आज मी आपल्यासाठी अप् (पाणी) आणि अग्नि या देवतांना उद्देशून रचलेल्या सोळा ते चोवीस या ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.
मराठी भावानुवाद :
☆
अ॒म्बयो॑ य॒न्त्यध्व॑भिर्जा॒मयो॑ अध्वरीय॒ताम् । पृ॒ञ्च॒तीर्मधु॑ना॒ पयः॑ ॥ १६ ॥
(या ऋचांचा व्हिडीओ गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)
☆ SSLV-D2 प्रक्षेपकाचे सफल प्रक्षेपण ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆
१० फेब्रुवारी २०२३ रोजी इस्रोने त्याच्या नवीन विकसित केलेल्या SSLV (Small Satellite Launch Vehicle) श्रेणीमधील प्रक्षेपकाचे दुसरे विकासात्मक उड्डाण यशस्वीरित्या पार पाडले. त्याला SSLV-D2 (Small Satellite Launch Vehicle-Development flight 2) असे नाव दिले आहे. सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरीकोटा येथील पहिल्या प्रक्षेपण तळावरून भारतीय वेळेनुसार सकाळी ०९:१८ मिनिटांनी प्रक्षेपक अवकाशात झेपावला. प्रक्षेपकावर तीन उपग्रह अधिभार म्हणून होते. EOS-07, JANUS-1 आणि AzaadiSAT-2. प्रक्षेपणानंतर साडेतेरा मिनिटांनी EOS-07 प्रक्षेपकापासून विलग झाला चौदा मिनिटांनी JANUS-1 वेगळा झाला आणि पंधरा मिनिटांनी AzaadiSAT वेगळा झाला. तीनही उपग्रहांना त्यांच्या निर्धारित कक्षेत म्हणजे ४५० किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत ३७ डिग्री कलासह (inclination) यशस्वीरीत्या प्रस्थापित केले गेले व इस्त्रोने एक मैलाचा टप्पा पार केला.
७ ऑगस्ट २०२२ रोजी SSLV च्या पहिल्या विकासात्मक उड्डाणावेळी प्रक्षेपकाच्या तीनही टप्प्यांनी व्यवस्थित काम करून प्रक्षेपकाला योग्य ती उंची व गती प्राप्त करून दिली,पण संगणक आज्ञावलीतील एका चुकीमुळे उपग्रह ३५६ किलोमीटर x ७६ किलोमीटर या लंबवर्तुळाकार कक्षेत प्रक्षेपित केले गेले. या कक्षेतील ७६ किलोमीटर हे अंतर पृथ्वीपासून एवढे जवळ आहे की वातावरणातील ओढीमुळे दोन्ही उपग्रह पृथ्वीकडे ओढले गेले. ही चूक दुसऱ्या विकासात्मक उड्डाणात सुधारण्यात आली.
SSLV हा घन प्रणोदक असणारा तीन टप्प्याचा प्रक्षेपक आहे. हा प्रक्षेपक द्रव प्रणोदनाधारित गती वियुज अनुखंडाद्वारे (velocity trimming midule) उपग्रहाला निर्धारित कक्षेत प्रस्थापित करतो. या प्रक्षेपकाद्वारे दहा किलोग्राम ते पाचशे किलोग्राम पर्यंतच्या लघु, सूक्ष्म व अती सूक्ष्म (mini, micro and nano) उपग्रहांना क्षैतीज कक्षेत (planar orbit) प्रस्थापित केले जाऊ शकते. अंतरिक्षात गरजेनुसार उपग्रह त्वरित सोडण्याची संधी SSLV कमीत कमी किंमतीत पुरवू शकतो. कार्यवाहीसाठी लागणारा कमीत कमी वेळ, एकाधिक उपग्रहांना सामावून घेण्याची लवचिकता, मागणीनुसार प्रक्षेपणाची व्यवहार्यता, प्रक्षेपणासाठी पायाभूत सुविधांची किमान आवश्यकता यामुळे SSLV हा जगातील एक अग्रेसर प्रक्षेपक ठरणार आहे.
SSLV-D2 हा ३४ मीटर उंचीचा व दोन मीटर व्यासाचा प्रक्षेपक असून उड्डाण समयी त्याचे वजन ११९ टन होते.
EOS-07 हा पृथ्वी निरीक्षण उपग्रह इस्त्रोने डिझाईन केलेला, विकसित केलेला आणि उत्पादित केलेला आहे. त्याच्या नवीन प्रयोगांमध्ये मिलिमीटर तरंग आर्द्रता ध्वनीजनक (Millimeter- wave Humidity Sounder) आणि वर्णपट निरीक्षक (spectrum monitoring) पेलोड्सचा समावेश आहे. उड्डाण समय त्याच्या वजन १५६.३ किलोग्रॅम होते त्याची आयुर्मयादा एक वर्ष असून त्याला २७.२१Ah च्या लिथियम आयन बॅटरीद्वारा ऊर्जा पुरवठा केला जातो. या उपग्रहाची उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत. (अ) सूक्ष्म उपग्रह बस (micro satellite bus)¹आणि भविष्यातील कार्यरत उपग्रहांना हव्या असलेल्या नवीन तंत्रज्ञानाशी सुसंगत अधिभाराचा आराखडा व विकास करणे.
(ब)नवीन तंत्रज्ञान सामावून घेणाऱ्या सूक्ष्म उपग्रहांची निर्मिती कमीत कमी वेळात करणे.
JANUS-1 हा १०.२ कि.ग्रॅ.वजनाचा अंटारीस सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म आधारित, तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दर्शविणाऱ्या कुशाग्र उपग्रहांच्या (smart satellite) मालिकेतील पहिला उपग्रह आहे. हा घटकीय वाहक (modular bus) प्रकारचा असून ऑनबोर्ड एज कॉम्प्युटिंग² च्या मदतीने मल्टी टेनंट पेलोड्स³,प्रोग्रॅमेबल स्मार्ट EPS⁴, S/X बँड⁵ SDR⁶, सिक्युअर TT&C⁷, SaaS⁸ प्लॅटफॉर्मसह डिजिटल ट्वीनिंग⁹ यांचे प्रात्यक्षिक दाखवितो.
AzaadiSAT-2 या उपग्रहाचे वजन ८.८ कि.ग्रॅ. आहे. या उपग्रह मोहिमेचा उद्देश अव्यवसायी आकाशवाणी संप्रेषण (Amareur radio communication) व LoRa¹⁰ या तंत्रज्ञानांचे प्रात्यक्षिक दाखविणे, अंतराळातील किरणोत्सर्गाच्या (radiation) पातळीचे मोजमाप करणे व विस्तारयोग्य उपग्रहांच्या बांधणीचे प्रात्यक्षिक दाखविणे हा आहे. भारताच्या सर्व राज्यांमधील ७५० विध्यार्थिनींना या उपग्रहावरील आधीभार तयार करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले होते. स्पेस किडझ् इंडियाच्या विध्यार्थी संघाने या अधिभारांची जोडणी केली.
टिपा :-
Satellite bus- हा उपग्रहाचा मुख्य भाग आणि संरचनात्मक घटक आहे. यामध्ये पेलोड्स व वैज्ञानिक उपकरणे असतात.
Edge computing- ही एक संगणन क्रिया असून ती वापरकर्त्याजवळ किंवा विदेच्या उगमाजवळ केली जाते. संगणक सेवा वापरकर्त्याजवळ किंवा विदेच्या उगमाजवळ पुरविल्यामुळे वापरकर्त्याला किंवा संस्थेला जलद व विश्वासनीय सेवा मिळते.
EPS- Encapsulated Post Script. याद्वारे व्हेक्टर ग्राफिक्सचे व्यवस्थापन केले जाते आणि घेतलेल्या प्रतिमांना उच्च विभेदन (high resolution) छपाईसाठी तयार केले जाते.
Vector graphics- कॉम्पुटरला क्रमाने दिलेल्या आज्ञा किंवा गणिती विधानांद्वारा तो रेषा किंवा आकार काढतो.
Band- मायक्रोवेव्ह श्रेणीतील लहरींच्या वारंवारीतेनुसार त्यांचे गट केले आहेत, त्यांना बँड म्हणतात. त्यांनाs, x वगैरे नांवे दिली आहेत.
SDR- Software Defined Radio ही एक रेडिओ दूरसंवाद प्रणाली आहे. जी विविध संकेतांवर (signals) कॉम्प्युटर सॉफ्टवेअरद्वारा प्रक्रिया करते.
TT& C- Telimetry, Tracking and Command म्हणजे उपग्रहाकडून आलेल्या संकेतांची (signals) उकल (decoding) करणे, त्याद्वारे उपग्रहाची स्थिती व त्याचे ठिकाण ठराविणे आणि त्यानुसार उपग्रहाला आज्ञा पाठविणे.
SaaS- Software as a Service यामुळे वापरकर्त्याला इंटरनेटवरील क्लाऊड आधारित ऍप्सशी संपर्क साधता येतो.
Digital twining – एकाद्या भौतिक वस्तू, प्रक्रिया किंवा प्रणालीचे डिजिटल प्रतिरूप. याचा उपयोग प्रतिमानविधान (simulation), एकीकरण (integration), चाचणी (testing), देखरेख (monitoring) व देखभाल (maintenance) यांसाठी केला जातो.
10. LoRa- Long Range हे एक खाजगी मालकीचे आकाशवाणी दूरसंवाद तंत्र आहे. हे चिर्प स्प्रेड स्पेक्ट्रम (CSS) तंत्रज्ञानापासून घेतलेल्या स्प्रेड स्पेक्ट्रम मोड्युलेशन तंत्रावर आधारित आहे.
पद्मश्री डॉ.विष्णू श्रीधर वाकणकर उर्फ हरिभाऊ वाकणकर, भारताच्या पुरातत्व शास्त्राचे पितामह. संपूर्ण जगात पुरातत्व संशोधनात हे नाव आदराने घेतलं जातं….. त्यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने आदरांजली.
वाकणकर म्हटल्यावर डोळ्यासमोर येते ते भीमबेटका. भोपाळच्या जवळ असलेल्या भीमबेटकाच्या गुहांत पुराश्म युगातली दगडावरची चित्रे शोधली ती हरिभाऊनी. भीमबेटकाला जगाच्या नकाशावर आणून त्यांनी मानाचे स्थान दिले. अलेक्झांडरच्या आधी भारताला इतिहासच नव्हता. किंबहुना भारत हे नावच अस्तित्वात नव्हते, ते देण्याची महान कृपाही इंग्रजांनी केली असं आपल्या डोक्यावर मारलं जात होतं. शत्रूच्या मनावर हल्ला केला,आत्मबल खच्ची केलं की राज्य करणं सोपं जात हे त्या धूर्त, मतलबी व्यापाऱ्यांना उमजले नसते तरच आश्चर्य. आपला इतिहास विकृत पद्धतीने मांडण्याचे यशस्वी प्रयत्न त्यांनी केले आणि आपल्याकडच्या काही ‘थोर’ विद्वानांनी त्यावर विश्वास ठेवला ! हरिभाऊंच्या या शोधामुळे आपला देश किती पुरातन आहे, इथली संस्कृती किती प्राचीन आहे याचे सज्जड पुरावे मिळाले. हा मोठा विजय आहे. प्रत्येकाची लढाई वेगळी,रणांगण वेगळं,शस्त्र वेगळी आणि शत्रूही वेगळे. समानता फक्त एकच –लक्ष्याप्रती असलेली प्रतिबद्धता ! हरिभाऊंनी याच बळावर लढाई जिंकली होती.
भीमबेटकातली शैलचित्रे त्यांनी कशी शोधली यापाठी एक लहानशी कथा आहे. ते कामाच्या निमित्ताने भोपाल ते नागपूर ट्रेनने प्रवास करत असत. भोपाळजवळ असलेल्या जंगलात त्यांना नेहमी दगडांचे उंच सुळके दिसत. इथे काय असेल याबद्दल त्यांना नेहमीच कुतूहल वाटायचं. सहप्रवाशांना विचारल्यावर तिथे गुहा आहेत, दाट जंगल आहे, तिथे कोणी जात नाही, असं समजलं. हरिभाऊना आता आंतरिक उर्मी स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी चालत्या ट्रेनमधून उडी मारून सरळ भीमबेटका गाठलं आणि आजवर काळोखात दडपून राहिलेला इतिहास जगासमोर आला. १९६१ पासून सलग सहा वर्ष त्यांनी भीमबेटकामध्ये संशोधन केले. साडेआठशे गुहांत पुराश्म आणि मध्य पुराश्म युगात राहिलेल्या माणसांनी दगडांवर काढलेली चित्रे सापडली. प्राणी, पक्षी, माणसे, झाडे, पाने,फुले आदी त्यांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या सगळ्याची चित्रे सापडली. पांढऱ्या आणि लाल नैसर्गिक, खनिज रंगांत असलेल्या या चित्रांत काही ठिकाणी हिरवे ठिपके दिसतात. जणू मोठा खजिना हाती लागला होता. माणसाच्या विकासाचा एक टप्पा उलगडायला मदत होणार होती.
त्यांनी सहा वर्षे सलग संशोधन कसं केल असेल हा विचार मनात येताच त्यांच्याविषयी आदर दाटून येतो. एवढे निबिड अरण्य, तिथे खायलाप्यायला काय मिळणार? ते पिशवीत बटाटे घेऊन जात. जंगलात गेल्यावर ते जमिनीत गाडत. सूर्याच्या प्रकाशाने, मातीच्या उबेने बटाटे शिजले की सोलून खात. हेच अन्न …. किती कठोर तपश्चर्या आहे ही ! भीमबेटकाचं महत्व सरकारच्या लक्षात आलं नव्हतं. त्यांनी हरिभाऊना वार्षिक १०००० रुपये इतके (घसघशीत !) अनुदान दिले होते. या रकमेतून त्यांचा चरितार्थ चालवणेही अवघड होते, मग संशोधनाला पैसा कुठून पुरणार ? तरीही संशोधनात खंड पडला नाही. रानात प्राण्यांचे भय असतेच. इतक्या जुन्या गुहांत वटवाघळाचा कुबट वास असतो. तिथेच तासनतास संशोधन करायचं योद्ध्याप्रमाणे ! युनेस्कोने भीमबेटका (भीमाची बैठक ) जागतिक वारसा जाहीर केलं. भारतात सापडलेले पुरातत्वीय पुरावे,वस्तू,चित्र आदी बाकी जगात सापडणाऱ्या पुराव्यांपेक्षा अधिक मोलाचे आहेत, पण त्यांची काळजी घेतली जात नाही, महत्व समजलं जात नाही याची त्यांना खंत होती.
‘सरस्वती शोध अभियान ‘ हाही त्यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प होता. सरस्वती नदीचा उल्लेख वेदात वारंवार येतो. पण प्रत्यक्षात ती शोधता आलेली नव्हती. वैदिक संस्कृती सरस्वतीच्या काठावर फुलली होती. या प्रकल्पाचे महत्व लक्षात घेऊन इस्त्रोने त्यांना मदत केली. पाकिस्तानातल्या आदिबिद्री पासून कच्छच्या रणापर्यंतचा चार हजार किलोमीटरचा प्रदेश त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अभ्यासला. हरीभाऊनी सरस्वती नदीचा शोध लावण्यासाठी संस्था स्थापन केली. त्यांच्याबरोबर पुरातत्व शास्त्रज्ञ, लोककला अभ्यासक, फोटोग्राफर आदी तज्ञ मंडळी होती. सेटेलाईट चित्रांच्या आधाराने त्यांनी सरस्वतीचा मार्ग शोधला. वैज्ञानिक कसोटी लावून तिची लुप्त होण्याची कारणे सिद्ध केली. आर्यांनी सिंधू सरस्वती संस्कृती नष्ट केली ही समजूत चुकीची आहे हे सिद्ध केलं. आर्य युरोपातून भारतात आले असा शोध युरोपियन लोकांनी लावला होता. तसे नसून आर्य मूळचे इथलेच आहेत हे त्यांनी ठासून सांगितले. सरस्वतीच्या अस्तित्वाबद्दल अविश्वास दाखवणाऱ्या लोकांसमोर भरभक्कम पुरावा ठेवला. तरीही लोक या संशोधनाला दुजोरा द्यायला धजावत नव्हते. कारण युरोपीय संशोधकांच्या विरुद्ध बोलल्यावर आपली किंमत कमी होईल अशी मनोधारणा होती. त्यांना गुलामगिरीच्या मानसिकतेचे वैषम्य वाटत असे. स्वातंत्र्य मिळाले तरीही मनाने स्वतंत्र झालो नाही. हरिभाऊनी जगासमोर पूर्ण आत्मविश्वासाने संशोधन ठेवले आणि आजवर थोपलेल्या मिथकांना आव्हान दिले.
१९५४ पासून त्यांनी भारतात आणि बाहेरच्या जगात शैलचित्र अभ्यासायला सुरवात केली. त्यांनी युरोप, अमेरिका आणि मध्य पूर्वेला शैलचित्रांचा अभ्यास करून पुरातत्वावर पुस्तके लिहिली. केवळ भारतात त्यांनी ४००० गुहा शोधल्या. त्यांनी चंबळ आणि नर्मदेच्या खोऱ्यांत संशोधन केले. त्यांनी महेश्वर, नेवाडा, मनोती, आवरा, इंद्रगड,कायथा, मंदसौर, आझाद नगर, दंगवाडा भागांत खोदकाम करून पुरातत्वीय पुरावे गोळा केले. त्यांनी इंग्लंड, फ्रांस, जर्मनी, इटली, स्पेन, ग्रीसमध्ये १९६१-६२ साली संशोधन केले. ते उत्कृष्ट चित्रकार होते. त्यामुळे शैलचित्र त्यांनी कागदावर उतरवली. अशी ७५०० चित्र वाकणकर संस्थानाकडे आहेत. त्यांनी सहा पुस्तके आणि ४०० शोधनिबंध प्रकाशित केले. ‘ वाकणकर भारतीय संस्कृती अन्वेषण न्यासा ‘च्या संग्रहालयात त्यांनी गोळा केलेली ५००० नाणी आहेत. ते नाणकशास्त्राचे तज्ञ होते. जी.डी.आर्ट्सची पदवी संपादन केल्यावर त्यांना पुरातत्वात विशेष रस वाटू लागला. भारतीय कलांमध्ये त्यांना रस होताच. कलांच्या संवर्धनासाठी त्यांनी संस्कारभारतीची स्थापना केली. उज्जैनच्या विश्व विद्यालयातल्या पुरातत्व उत्खनन विभागाचे आणि रॉक आर्ट इन्स्टिट्यूटचे ते संस्थापक आहेत. ललित कला संस्थान आणि शैलचित्र कला संस्थानाचे ते संचालक होते. त्यांनी ‘मेरा पुरातत्त्वीय उत्खनन ‘आणि ‘भारतीय शैलचित्र कला’ ही पुस्तके लिहिली. हिंदीमध्ये कथासंग्रह प्रसिद्ध केला आणि आर्य प्रश्नावर रोबर्ट आर. यांच्यासह लेख लिहिला. २५० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित केले. भीम बेटकाच्या शैलचित्रांवर प्रदर्शने भरवली. १९७५ साली हरिभाऊना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.
माळव्यातल्या मंदसौर जिल्ह्यातल्या नीमचमध्ये ४ मे १९१९ रोजी हरीभाउंचा जन्म झाला. त्यांच्या पत्नीला सर्वजण लक्ष्मीवाहिनी नावाने ओळखत. पतीच्या कार्यात त्यांचा तन मन धन अर्पून सहभाग होता. लक्ष्मी वहिनींचा त्याग तितकाच मोठा आहे. हरिभाऊच्या पायावर चक्र पडलं होत. अशा व्यक्तीबरोबर संसार करणे किती कठीण असते ते लक्ष्मी वहिनीच जाणो. हरिभाऊचे कुटुंब आर्थिक दृष्ट्या सबळ नसले तरी समाजकार्य आणि राष्ट्रप्रेम या शिकवणीची शिदोरी त्यांना कुटुंबाकडून मिळाली. सुरुवातीच्या काळात त्यांनी उज्जैनमध्ये एक आर्ट सेंटर चालवून अर्थार्जन केले. कालिदासाने मेघदूत लिहिले ती जागा या परिसरात असायला हवी असे त्यांना वाटत असे. त्यानुसार त्यांनी रामगिरी पर्वतावर जाऊन शोधायला सुरुवात केली, पूर्ण प्रदेश विंचरून काढल्यावर एका गुहेवर ‘मेघदूत’ अशी अक्षरे सापडली. एका बाजूला ‘सुतनुका’ लिहिलेले दिसले आणि थोडे पुढे गेल्यावर ‘कालिदास’ असे लिहिलेले दिसले. पुढे कालिदासावर अधिक संशोधन केल्यावर हेच ते स्थान हे सिद्ध झाले.
त्यांनी अजून एक महत्त्वाचे संशोधन केले. उज्जैनजवळच्या डोंगला गावात २१ जून रोजी सूर्यकिरण पृथ्वीशी लंबकर्ण अवस्थेत पडतात. त्यामुळे सावली पडत नाही. हे गाव प्राचीन काळाचे time meridian होते. कर्कवृत्त आणि रेखावृत्त इथे एकमेकांना छेद देतात. हरिभाऊनी कुठल्याही आधुनिक उपकरणांचा वापर न करता ती जागा दाखवून दिली. प्राचीन काळी हे वृत्त उज्जैनमधून जात असल्याने तिथे कर्कराजेश्वर मंदिर बांधले होते ! उज्जैनच्या वेधशाळेला वाकणकरांचे नाव दिले आहे. भारतीय पुरातत्व खात्यातर्फे हरिभाऊंच्या नावे पुरस्कार दिला जातो. पुरातत्वात रचनात्मक आणि सृजनात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तीला दोन लाख रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
१९८८ साली सिंगापूरला एका हिंदू संमेलनाच्या निमित्ताने गेले असताना खिडकीतून दिसणाऱ्या चित्राचे रेखाटन करताना त्यांना मृत्यू आला. उणेपुरे सत्तर वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले, जे खऱ्या अर्थाने ‘जीवन’ होते. संशोधकाचा मूळ पिंड असलेले हरिभाऊ कलाकार होतेच, राष्ट्रभक्तही होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य करताना महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पूर्ण करत होते. आनंदी,खेळकर स्वभावामुळे संकटाना सहज सामोरे जात. आपला ‘खरा’ इतिहास समोर येण्याची नितांत गरज आहे याची त्यांना जाणीव होती आणि त्यासाठी ते आयुष्यभर झटले. हरिभाऊनी सुरु केलेल्या कार्याची पताका पुढे नेण्यासाठी संशोधक काम करत आहेत, निश्चितच हे कार्य लवकर सुफळ होईल. मानसिक गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त झालेला त्यांच्या स्वप्नातला भारत नवा, स्वाभिमानी, आत्मविश्वासपूर्ण भारत असेल, हीच आपणा सर्वांकडून त्यांना वाहिलेली आदरांजली असेल.
कुसुमाग्रजांच्या कवितेच्या ओळींची इथे आठवण होते:
रात सरे ये प्राचीवरती तेजाची रेषा,
नव्या मनूचा घोष घुमे हा, दुमदुमतात दिशा…
जागृत झाल्या दलित जगाच्या बलशाली आशा ….
डॉ. अस्मिता हवालदार
इंदूर
संग्राहिका – सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मरावे परी — एक सत्यकथा ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆
मृत्युशय्येवर अखेरच्या घटका मोजीत असलेल्या टॉम स्मिथने आपल्या मुलांना आपल्याजवळ बोलावून घेतले आणि तो त्यांना म्हणाला, “बाळांनो, मी आज या जगाचा निरोप घेत आहे, परंतु जातांना मला तुम्हा मुलांना एव्हढंच सांगायचं आहे की मी आजपर्यंत जसं सरळमार्गी आयुष्य जगलो तसंच जीवन जर तुम्हीही जगाल तर मला जी मनःशांती लाभली ती तुम्हालाही लाभेल.”
त्याची मुलगी सारा म्हणाली, “बाबा, आमचं हे दुर्दैव आहे की तुम्ही हे जग सोडून जातांना तुमचं बँक खातं हे पूर्णपणे रितं झालेलं आहे. आमच्यासाठी तुम्ही काहीच पैसा शिल्लक ठेवला नाहीत. ज्यांचा तुम्ही भ्रष्ट, सरकारी पैसा चोरणारे चोर, अशा शेलक्या शिव्यांनी उद्धार केलात, अशा सर्व लोकांनी आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या मागे भरपूर संपत्ती ठेवली आहे. आपलं तर हे घरसुद्धा आपल्या मालकीचं नसून भाड्याचं आहे. निदान मी तरी तुम्ही दाखवलेल्या आदर्श मार्गावरून चालणार नाही. आम्हाला आमचा मार्ग निवडू द्या.”
थोड्याच वेळात स्मिथने आपला अखेरचा श्वास घेतला आणि त्याचा देह निष्प्राण होऊन पडला.
तीन वर्षांनंतर सारा एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करण्यासाठी मुलाखत द्यायला गेली..
मुलाखतीदरम्यान तिला मुलाखतकाराने विचारलं, ” तुझं आडनांव काय म्हणालीस? स्मिथ ना? कुठली बरं ही स्मिथ…..?
यावर सारा म्हणाली, “मी सारा स्मिथ. माझे वडील टॉम स्मिथ. ते आता हयात नाहीत.”
मुलाखत घेणाऱ्या पॅनेलच्या अध्यक्षाने जरा अविश्वासाच्या सुरातच विचारलं, ” ओहो, तू टॉम स्मिथची मुलगी आहेस? “
— पॅनेलमधील इतर सदस्यांकडे एकवार नजर टाकून तो म्हणाला, ” हा स्मिथ नावाचा मनुष्य तोच आहे बरं का, ज्याने ‘ Institute of Administrators ‘ या संस्थेमध्ये माझ्या सभासदत्वाच्या अर्जावर स्वाक्षरी केली होती, आणि आज त्याच्याच शिफारशींमुळे मी या पदापर्यंत पोहोचू शकलो. त्याने हे माझ्यासाठी अगदी निरपेक्षपणे, कसलाही मोबदला न घेता केलं. मला तर त्यांचा पत्ताही माहित नव्हता. त्यांची माझ्याशी कसलीही ओळख नव्हती, पण तरीही हे त्यांनी केवळ माझ्या हितासाठी केलं…”
इतकं बोलून तो साराकडे वळून म्हणाला, ” मला तुला आता कुठलाच प्रश्न विचारायचा नाहीये. तुला ही नॊकरी मिळालीच आहे असं समज. उद्या येऊन तुझं नियुक्ती पत्र या कार्यालयातून घेऊन जा…”
— सारा स्मिथ कॉर्पोरेट अफेअर्स मॅनेजर म्हणून कंपनीत नियुक्त झाली.. तिच्या दिमतीला ड्रायव्हरसहित दोन कार्स, कार्यालयाला लागूनच असलेला एक डुप्लेक्स बंगला आणि दरमहा एक लाख पौंडांचा पगार आणि याशिवाय इतर भत्ते आणि खर्च इत्यादी मिळू लागलं.
नोकरीत दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अमेरिकेतून आपल्या देशात परतले आणि त्यांनी आपली निवृत्ती घोषित केली. त्यांच्या जागी नवी नियुक्ती करणं आवश्यक होतं. या जागेसाठी अतिशय विश्वसनीय मनुष्याची आवश्यकता होती. आणि या जागेसाठी कंपनीच्या सल्लागारांनी पुन्हा एकदा सारा स्मिथच्याच नांवाला पसंती दिली.
एका मुलाखतकाराला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये तिला जेव्हा नोकरीतील तिच्या यशाचं गुपित विचारल्या गेलं तेव्हा अश्रूभरल्या नेत्रांनी ती उत्तरली, ” माझ्या वडिलांनीच माझ्या यशाचा मार्ग मला आखून दिला होता. ते जेव्हा स्वर्गवासी झाले तेव्हा मला कळलं की सांपत्तिकदृष्ट्या जरी ते गरीब होते, तरी सचोटी, शिस्त आणि प्रामाणिकपणा या गुणांनी ते खूप खूप श्रीमंत होते.
“आता इतक्या वर्षांनी वडिलांच्या आठवणींनी रडण्याइतक्या आपण लहान नसूनही आपल्या डोळ्यांत त्यांच्या आठवणींमुळे पाणी कां येते?” — मुलाखतकाराच्या या प्रश्नावर त्या उत्तरल्या, ” माझ्या वडिलांच्या मृत्यूसमयी मी त्यांना ते आयुष्यभर सचोटीच्या मार्गाने चालले या गोष्टीसाठी अपमानास्पद बोलले होते. आज मी त्यासाठी त्यांची क्षमा मागतेय. ते मला त्यांच्या थडग्यातून उठून निश्चितच माफ करतील अशी मला आशा आहे. मी आज या पदावर पोहोचले ते केवळ त्यांच्या पुण्याईमुळे. यात माझं श्रेय काडीचंही नाही.”
मग शेवटी तिला आणखी एक प्रश्न विचारण्यात आला.
“मग आपण आपल्या वडिलांनी जो मार्ग आपल्याला आखून दिला आहे त्याच मार्गाचं अनुसरण कराल का?”—- यावर त्या म्हणाल्या, ” मी आता माझ्या वडिलांना खूप मानते. त्यांचं एक भव्य तैलचित्र मी माझ्या दिवाणखान्यात प्रवेशदारासमोरच लावून ठेवलंय. माझ्यापाशी आज जे काही आहे त्याचं श्रेय भगवंताच्या खालोखाल मी माझ्या वडिलांनाच देते.”
आपणही टॉम स्मिथसारखेच आहोत का..? —-
कीर्ती रूपाने शिल्लक राहता येऊ शकते. कीर्ती पसरायला आणि कीर्तीरूपाने जिवंत रहाण्यासाठी वेळ लागतो जरूर, पण त्या रूपाने माणूस अमर होऊन जातो..सचोटी, शिस्त, स्वतःवर ताबा ठेवणं आणि परमेश्वर आपल्याकडे पाहतोय याची सदोदित जाणीव हे गुणच माणसाचं खरं धन आहे, बँक खात्यातील अमाप पैसा नव्हे..आपल्या मुलाबाळांसाठी हा वारसा ठेवावा..
—आपणही या परिवर्तनाचे अग्रदूत बनू या आणि ही सत्यकथा आपल्या माणसांत अधिकाधिक शेअर करू या.
संग्राहक : श्री विनय माधव गोखले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ एकशे दहा वर्षे चाललेली पावलं!… ☆ श्री संभाजी बबन गायके☆
— अर्थातवाळवंटातीलवाटाड्याशूरवीररणछोडदासराबरी !
“साब ! म्हारो थैलो तो नीच्चे रहि गयो!” हेलिकॉप्टरमध्ये बिनधास्तपणे बसलेल्या त्या वृद्धाने म्हणल्याबरोबर त्यांच्यासोबतच्या लष्करी अधिका-यांनी हेलिकॉप्टर ताबडतोब माघारी फिरवलं आणि विमानतळावर उतरवलं ! सुरकतलेलं पण अजूनही काटक शरीर, पीळदार आणि अगदी दाट मिशा, आणि मुख्य म्हणजे दगडासारखे मजबूत पाय असलेल्या त्या आजोबांचे वय होतं १०७ वर्षे फक्त….होय…. अवघे एकशे सात वर्षे !
हे आजोबा हेलिकॉप्टरमध्ये लष्करी अधिका-यांसमवेत कसे?—
आजोबांना महान सेनापती फिल्ड मार्शल सॅम माणेकशा साहेबांनी खास आणि तेही तातडीनं बोलावणं धाडलं होतं. तामिळनाडूमधील वेलिंग्टन हॉस्पिटलमध्ये दाखल असलेले माणेकशासाहेब कधी शुद्धीत तर कधी अर्धवट बेशुद्धीमध्ये सतत ‘पगी…पगी’ असा काहीतरी उच्चार करताना तेथील डॉक्टरांनी ऐकलं होते! “कोण पगी?” असं विचारलं गेल्यावर साहेबांनी ‘पगी’ ची कहाणी अगदी इत्यंभूत सांगितली….आणि त्या ‘पगी’ची भेट व्हावी,अशी इच्छा व्यक्त केली…नव्हे तसा आदेशच दिला !
लष्कराने ‘पगी’चा शोध घेतला आणि राजस्थानमधील पाकिस्तानी सीमेवर असलेल्या बनासकांथा येथील ‘निंबाला गावातून या आजोबांना सोबत घेतलं..त्यांच्यासाठी खास हेलिकॉप्टरची व्यवस्थाही करण्यात आली होती. माणेकशा साहेबांचं नाव घेताच आजोबांच्या डोळ्यांत निराळीच चमक आली. त्यांनी घरातील महिलांना काहीतरी सांगितलं. त्या महिलांनीही लगबग करून पंधरा-वीस मिनिटांत एक कापडी थैली आजोबांच्या हाती दिली. जवळच्या लष्करी तळावरून हेलिकॉप्टरने उड्डाण केलं आणि तेवढ्यात आजोबा म्हणाले,”साब म्हारो थैलो तो नीच्चे रहि गयो!” हेलिकॉप्टर उतरवलं गेलं, थैली शोधली गेली. सुरक्षिततेच्या कारणांसाठी त्या थैलीत काय आहे? याची तपासणी केली…थैलीत दोन कांदे, दोन बाजरीच्या भाकरी आणि पिठलं एवढंच होतं ! “ सॅम साब को बहोत पसंद है! कभी कभी हमरा खाना चखा करते थे बॉर्डर पर ” –आजोबांनी सांगितलं…हेलिकॉप्टरने पुन्हा भरारी घेतली !
रूग्णशय्येवर असलेले सेनापती माणेकशासाहेब या ‘पगी’ला पाहून उठून बसले.
“आओ, पगी…रणछोडदास…..!” साहेब आपल्या खणखणीत आवाजात उदगारले! ‘पगी’ने त्यांना ताठ उभे राहून आणि थरथरत्या हातांनी सल्यूट बजावला. साहेबांनी त्यांना जवळ बसवून घेतलं….त्यांच्या हातातील पिशवी घेतली ! त्या दिवशी एक सैनिक आणि एक सेनापती एकत्र बसून जेवले ! कृष्ण-सुदामाची भेट आणि पोहे हीच कथा जणू पुन्हा घडत होती…सुदाम्याच्या शिदोरीत पोहे होते… या सुदाम्याच्या शिदोरीत कांदा-भाकरी आणि पिठलं !
पग म्हणजे पाय हे समजण्यासारखं आहेच. परंतू ‘ पगी म्हणजे पायांच्या ठशांचा माग काढणारा किंवा वाळवंटातून वाट दाखवणारा !’ क्षितिजापर्यंत वाळूच वाळू, त्यात अंधार….नक्की कोणत्या दिशेला जायचं याबद्द्ल नवख्यांचा गोंधळ होणारच. पण राजस्थानातल्या याच वाळूत जन्मलेली, वाढलेली,गुरे-उंट हाकलेली आणि शेवटी याच वाळूत मिसळून गेलेली राजस्थानी माणसं वाळूचा कण न कण ओळखू शकतात…अंधार असला तरी !
१९०१ मध्ये या वाळूत, पशुपालक कुटुंबात आपल्या या कथानायकाचा जन्म झाला. नाव ठेवले गेले ‘रणछोडदास’! भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या जरासंधाशी झालेल्या युद्धात हे नाव जरासंधाकडूनच प्राप्त झाले…असे म्हणतात. युद्धात जनतेची हानी होऊ नये म्हणून श्रीकृष्ण भगवंतांनी, युद्ध योजनेचा एक भाग म्हणून, रणांगणातून तात्पुरते पलायन केले म्हणून ते रण सोडून जाणारे….रणछोड ! पुढे जरासंधाचा नि:पात झाला !
पण हे कलियुगातील आणि मानवी अवतारातील रणछोडदास १९६५ आणि १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धात भारतीय सेनेच्या अग्रभागी राहिले होते ! आयुष्यभर वाळवंट तुडवलेले रणछोडदास उंटांच्या वाळूत उमटलेल्या पावलांच्या ठशांवरून, माणसांच्या पायांच्या खुणांवरून, एक ना अनेक गोष्टींचा अचूक अंदाज बांधायचे. किती उंट असतील? त्यावर किती माणसे बसलेली असतील? त्यांच्यासोबत चालणारे प्रवासी किती असतील? त्यात स्त्रिया किती आणि पुरूष किती असतील? त्यांची वजने आणि उंची किती असेल?….रणछोडदास यांचा अंदाज चुकायचा नाही..दिवस असो वा रात्र !
१९६५ मध्ये प्रत्यक्ष युद्ध सुरू होण्याआधी पाकिस्तान्यांनी कितीतरी वेळा भारतीय हद्दीमध्ये, कच्छच्या रणात घुसखोरी केलेली होतीच. युद्धाच्या आरंभी त्यांनी कच्छ भागातील विधकोट ठाणे काबीज केले होते. त्यात जवळजवळ १०० भारतीय सैनिक धारातीर्थी पडले होते. भारतीय सैन्याचे एक मोठे दल त्या भागाकडे पाठवले गेले. अंतर जास्त होते आणि रस्ते अनोळखी. तिथून जवळच असलेल्या छारकोटपर्यंत आपले सैन्य वेगाने पोहोचणे गरजेचे होते. पाकिस्तान्याचे १२०० सैनिक सीमेवरील एका गावाजवळच्या जंगलात लपून बसले होते. रणछोडदास यांनी त्यांचा अचूक माग काढला. आपल्या सेनेला अवघड वाटेवरून अचूकपणे आणि अत्यंत त्वरेने म्हणजे अपेक्षित वेळेपेक्षा बारा तास आधीच शत्रूपर्यंत पोहोचवले. इतक्या लवकर भारतीय सैन्य आपल्याला शोधून काढेल याची पाकिस्तान्यांना शक्यताच वाटली नव्हती. भारतीय जवानांनी पाकिस्तान्यांना धूळ चारली ! रणछोडदास या सामान्य ‘पगी’चा, वाटाड्याचा या विजयात मोठाच हातभार लागला ! बी.एस.एफ.अर्थात बॉर्डर सिक्योरिटी फोर्स (अर्थात सीमा सुरक्षा दल आणि अर्थातच सीमा सुरक्षा बल) यांनी बनासकांथा येथील एका सैन्यचौकीला ‘रणछोडदास’ यांचे नाव देऊन त्यांच्या कर्तबगारीचा अनोखा गौरव केला आहे.
फिल्ड मार्शल माणेकशासाहेबांनी रणछोडदास यांची अनोखी क्षमता ओळखून त्यांच्यासाठी लष्करात ‘पगी’ (गाईड,वाटाड्या,पथ-मार्गदर्शक) हे विशेष पद निर्माण केले. या दूरदृष्टीच्या निर्णयाचा १९७१ च्या लढाईतही खूप फायदा झाला. पालीनगर ही पोस्ट जिंकून घेण्याच्या यशस्वी मोहिमेत पथ-मार्गदर्शन करणा-या रणछोडदास यांचाही मोठा वाटा होता. हे काम करताना त्यांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही. याबद्द्ल माणेकशासाहेबांनी त्यांना स्वत:च्या खिशातून तीनशे रुपयांचे रोख पारितोषिकही दिले होते आणि त्यांना भोजनासाठीही आमंत्रित केले होते ! संग्राम मेडल, पोलिस मेडल आणि समर सेवा स्टार असे पुरस्कारही भारतीय लष्कराने रणछोडदास यांना प्रदान केले ! शौर्याची कदर करावी ती फिल्ड मार्शल सॅम माणेकशा साहेबांसारख्या जिंदादिल सेनानींनीच आणि भारतीय लष्करानेच !
माणेकशासाहेबांना आपल्या या गुणी, देशप्रेमी, धाडसी सैनिकाची आठवण न आली तरच नवल ! आपल्या अंतिम दिवसांत तर ही आठवण अधिकच तीव्र होत गेली….आणि त्यांनी ‘पगी’ रणछोडदास राबरी (राबडी) यांना अत्यंत सन्मानाने बोलावून घेतले.
२७ जून, २००८ रोजी माणेकशासाहेब निवर्तले. ‘पगी’ रणछोडदास यांनी लगेचच म्हणजे २००९ मध्ये, त्यांच्या वयाच्या तब्बल १०८ व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली….मानवी आयुष्याची १०० वर्षांची मर्यादा ओलांडलेले शरीर काम तरी किती दिवस करणार? वयाच्या ११२ व्या वर्षी अर्थात २०१३ मध्ये हा पगी स्वर्गाची वाट चालण्यासाठी कायमचा निघून गेला ! त्यांच्या पावलांचे ठसे राजस्थानातल्या वाळवंटाच्या मनात अजूनही ताजे असतील. जय हिंद !
आपल्यापैकी अनेकांनी ही माहिती पहिल्यांदाच वाचली असेल….मी ही नुकतीच वाचली. काही सैनिकी ज्येष्ठ अधिका-यांनी ही माहिती इंग्लिशमध्ये लिहिलेली आहे. ब-याच वृत्तपत्रांनीही रणछोडदास साहेबांविषयी भरभरून लिहिले आहे. मराठीत असे काही (माझ्यातरी) वाचनात आले नाही. मी जे वाचले त्याचाच हा स्वैर अनुवाद आहे. तपशीलात अर्थातच काही कमीजास्त असेल..दिलगीर आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या एका हिंदी युद्धपटात रणछोडदास यांची व्यक्तिरेखा दाखवली गेली, असे म्हणतात. संजय दत्तने ‘पगी’ कसा रंगवला असेल,देव जाणे ! हिंदी सिनेमावाले काय काय आणि कसे कसे दाखवतील याचा नेम नाही. असो. गुजराती लोकगीतांमध्ये रणछोडदास यांच्या कर्तृत्वाचा उल्लेख होतो…यापेक्षा अधिक काय नाव मिळवावे एका सामान्य माणसाने? मन:पूर्वक सल्युट ….
☆ ‘संगमनेरमध्ये सुरु आहे आगळी वेगळी परंपरा …’ ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆
— इंग्रजांनाझुकवणारीस्त्री – शक्ती .
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे साजऱ्या होणाऱ्या हनुमान जन्मोत्सवाला आगळं वेगळं महत्त्व आहे.
या दिवशी या ठिकाणी निघणाऱ्या रथ यात्रेत बजरंगबलीचा रथ ओढण्याचा मान महिलांना मिळतो.
महिलांना या ठिकाणी मिळणाऱ्या या मानाला ब्रिटीशकालीन इतिहास आहे. ब्रिटीशांनी या रथ यात्रेवर बंदी घालून अनेक तरुणांना ताब्यात घेतले होते. २३ एप्रिल १९२९ रोजी हनुमान जयंतीच्या पहाटे मंदिराभोवती पोलिसांचा गराडा पडला. पोलीस आपल्या सरकारी ताकदीच्या जोरावर मिरवणुकीस करत असलेला विरोध पाहता नेते मंडळी घरी गेली. एवढ्यात अचानक २०० ते २५० महिलांनी एकत्र येत रथ ताब्यात घेतला. ब्रिटीशांनी बंदी घातलेल्या रथाला, बंदी झुगारून शेकडो महिलांनी रथ यात्रा काढली होती. पोलिसांनी महिलांबरोबर अनेक युक्तिवाद केले, भीती दाखवली, अटक करण्याची- खटले भरण्याची धमकीही दिली. सरकारी ताकदीचा रुबाब दाखवला. पण या आदिशक्ती स्वरूप भारतीय नारींनी आपला उत्सव पार पाडण्याचा निर्धार कायम ठेवला.
या गडबडीचा फायदा घेत झुंबरबाई अवसक, बंकाबाई परदेशी, लीला पिंगळे आणि इतर मुली, महिलांनी रथावर चढून हनुमान प्रतिमा रथावर ठेऊन ” बलभीम हनुमान की जय ” चा जयघोष केला, आणि रथयात्रा व्यवस्थितपणे पार पाडली. तेव्हापासून ही परंपरा आजही सुरु आहे.
आता या रथयात्रेदरम्यान पोलिसांना विशेष मान असून पोलिसांनी वाजत गाजत आणलेला झेंडा रथावर लावल्यावरच रथ ओढला जातो.
माहितीसंग्राहिका – सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २३ – ऋचा ७ ते १५ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २३ (अप्सूक्त)
ऋषी – मेधातिथि कण्व
देवता : ७-९ इंद्रमरुत्; १०-१२ विश्वेदेव; १३-१५ पूषन्;
ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील तेविसाव्या सूक्तात मेधातिथि कण्व या ऋषींनी अनेक देवतांना आवाहन केलेली असली तरी हे मुख्यतः जलदेवतेला उद्देशून असल्याने हे अप् सूक्त सूक्त म्हणून ज्ञात आहे. यातील सात आणि नऊ या ऋचा इंद्राचे आणि मरुताचे, दहा ते बारा ऋचा विश्वेदेवाचे आणि तेरा ते पंधरा या ऋचा पूषन् देवतेचे आवाहन करतात. या सदरामध्ये आपण विविध देवतांना केलेल्या आवाहनानुसार गीत ऋग्वेद पाहूयात. आज मी आपल्यासाठी इंद्र, मरुत् विश्वेदेव आणि पूषन् या देवतांना उद्देशून रचलेल्या सात ते पंधरा या ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.
(या ऋचांचा व्हिडीओ गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)