मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘विस्मृतीतील मोती…. स्क्वाड्रन लीडर देवय्या!!…’ ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘विस्मृतीतील मोती…. स्क्वाड्रन लीडर देवय्या!!’ ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी

‘६ सप्टेंबर हा दिवस पाकिस्तानचा संरक्षण दिवस ‘ म्हणून साजरा केला जातो. म्हणजे पाकिस्तानसाठी या दिवसाचं महत्व किती असेल याची कल्पना करा! आणि ते तसं होतंच! 

कारण त्याच दिवशी संध्याकाळी पाकिस्तानने आपल्या पठाणकोट, आदमपूर आणि हलवारा या हवाईदलाच्या तीन तळांवर अकस्मात हल्ले केले होते. महत्वाची बाब म्हणजे तेव्हा अधिकृतपणे युद्ध सुरू झाल्याची घोषणा होणे बाकी होते! अर्थात ऑगस्ट महिन्यापासूनच सीमेवर चकमकी चालू होत्या. आपल्या छाम्ब क्षेत्रात पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात रणगाडे घुसविले होते. त्यामुळे छाम्ब क्षेत्रावर दबाव आला होता. हा दबाव कमी करण्यासाठी आपल्या हवाईदलाने ६ सप्टेंबरला सकाळी लाहोरवर बॉम्ब वर्षाव केला होता. त्याला फारसा विरोध झाला नव्हता, कदाचित म्हणून आपण थोडे बेसावध असू.

तर या तीन ठिकाणांपैकी आदमपूर आणि हलवारा या दोन तळांवर आपल्या हवाईदलाच्या गस्त आणि प्रखर प्रतिकारामुळे आलेली पाकिस्तानची विमाने फारसे नुकसान करू शकली नाहीत. मात्र पठाणकोटवर झालेला हल्ला एवढा अनपेक्षित आणि अकस्मात होता की आपल्या हवाईदलाला प्रतिकार करायलाही उसंत मिळाली नाही! तेथील तळावर असलेली आपली दहा विमाने जागेवरच नष्ट झाली!! पाकिस्तानच्या दृष्टीने हा विजय किती मोठा असेल याची आपण कल्पना करू शकतो! 

त्या वेळची पाकिस्तान आणि भारताची विमानदलांची तौलनिक स्थिती काय होती.. तर आपल्याकडे नॅट, हंटर, व्हॅम्पायर्स, कॅनबेरा, माईस्टर्स, आणि मिग २१ अशी त्या काळी सुद्धा जवळपास कालबाह्य झालेली विमाने होती!! तर पाकिस्तानकडे होती एफ १०४ स्टार फायटर्स.. त्या काळची जगातील सर्वोत्तम फायटर् विमाने.. जी अमेरिकेने त्यांना जवळ जवळ फुकट दिली होती. त्या शिवाय एफ ८६ सॅबरजेट, बी ५७ कॅनबेरा बॉम्बर, एच ४३, एस ए १६, सी १३० अशी हवाई क्षेत्रातील सर्वात बलाढ्य आणि आपल्या विमानांच्या तुलनेत चौपट वेगवान विमाने!! 

आपल्या वायुदलाला ही वस्तुस्थिती माहीत नव्हती काय?? नक्कीच माहीत होती. त्यांनी आपल्यापाशीही अशी वेगवान विमाने असावीत म्हणून तात्कालीन सरकारकडे शेकडो वेळा मागणी केली होती. पण आपल्या सरकारचे ‘शांती’ हे ब्रीदवाक्य होते. युद्ध या शब्दाचा त्यांना प्रचंड तिटकारा होता. त्यातच चीनकडून प्रचंड पराभव झाल्याने सरकारमधील श्रेष्ठी आधीच खचले होते. त्यात हवाईदलाची ही मागणी म्हणजे पुन्हा युद्ध.. आणि युद्ध करण्याच्या मानसिकतेत सरकार नव्हते. सबब आहे त्या तुटपुंज्या साधनांनी लढणे तिन्ही दलांना क्रमप्राप्त होते.. याची अपरिहार्य परिणती आपल्या सैन्याचे, वायुदल, नौदलाचे प्रचंड प्रमाणात नाहक शिरकाण होण्यात होणार, हे नक्की होते! सर्व सेनादलांचे प्रमुख यांना ही गोष्ट स्पष्ट दिसत होती.. पण प्राणपणाने लढणे एवढेच त्यांच्या हातात होते…!!

तर सहा तारखेच्या त्या जबरदस्त अपमानाचा बदला घेण्याचे त्याच रात्री ठरले. या वेळी नशीब म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र मान. यशवंतराव चव्हाणसाहेब हे केंद्रात संरक्षणमंत्री होते. त्यांनी तात्काळ प्रतिकाराचे आदेश दिले.

आता पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले जाणार हे नक्की होते. अर्थात पाकिस्तानला हे अपेक्षित असणार हे लक्षात घेऊन सीमेवरच्या हवाई तळांवर हल्ले न करता पाकच्या आत खोलवर.. जिथे एफ १०४ स्टार फायटर्सचा मुख्य तळ होता, त्या सरगोधा या अति महत्वाच्या तळावर घाव घालण्याचे नक्की झाले. या हल्ल्याची कमान आदमपूर येथील हवाई तळाने स्वीकारली.

आणि सात तारखेला पहाटे आपल्या आठ विमानांनी उड्डाण केले. सुरुवातीला बारा विमाने पाठविण्याचे ठरले होते, पण ऐन वेळी फक्त आठ विमाने या मोहिमेसाठी निवडली गेली. सूडाच्या आगीने धुमसत असलेल्या आपल्या आठही वैमानिकांनी प्रचंड त्वेषाने शक्य तेवढ्या वेगाने जात सरगोधा हवाईतळ गाठला. सर्व पाकिस्तानी तळ गाफील होता. पाकिस्तानच्या एवढ्या आत असलेल्या आणि अति वेगवान अशा बारा एफ १०४ स्टार फायटर्सचा तळ असलेल्या जागी आपल्या पठाणकोटवरच्या विजयी हल्ल्याच्या फक्त बारा तासांच्या आत भारतीय विमानदल धडक मारेल हे पाकिस्तानी विमानदलाच्या स्वप्नातही आले नसेल आणि रात्रीच्या विजयाच्या आनंदात युद्धातील विजयाचे स्वप्न पहाणाऱ्या त्या पाकी तळावर वीज कोसळावी, तसा आपल्या आदमपूर येथील वीर वैमानिकांनी भयानक हल्ला चढवला. त्यांची ११ – एफ १०४ स्टार फायटर्स विमाने उभ्या जागी अल्लाला प्यारी झाली. संपूर्ण तळ जवळपास नष्ट झाला. मात्र तशाही स्थितीत एक एफ १०४ स्टार फायटर आकाशात उडाले. तोपर्यंत आपली विमाने परतीच्या प्रवासाला लागली होती. पण एफ १०४ स्टार फायटरचा वेग एवढा प्रचंड होता की, त्याने आपल्या विमानांना जवळ जवळ गाठलेच.. त्या पाकी विमानात अत्याधुनिक मिसाईल्स होती. जर त्याला अडविले नसते तर आपल्या सर्व विमानांचा विनाश ठरलेला होता!!

पण अडवणार तरी कसे.. त्या विमानाचा वेग आपल्यापेक्षा चौपट.. शिवाय मिसाईल्स..

आणि अशा वेळी त्या विमानाला अंगावर घेतले ते आपल्या एका असामान्य शूर वीराने.. श्री. अजामदा बोपय्या देवय्या हे त्या शूर वैमानिकाचे नाव..

या असामान्य शूर वीराने आपले विमान सरळ त्या अजस्त्र एफ् १०४ स्टार फायटरच्या अंगावर घातले! सरळ समोरासमोर धडकवले! याची परिणती काय होणार, हे देवय्यांना पुरेपूर माहीत होते.. तरीही भारतमातेच्या या सुपुत्राने आपल्या हवाईदलासाठी अत्यन्त बहुमूल्य असलेल्या उरलेल्या सात विमानांसाठी आणि त्या पेक्षाही बहुमोल असलेल्या आपल्या वैमानिकांसाठी आपल्या प्राणाची या यज्ञात आहुती देण्याचे ठरविले होते. इतर कोणत्याही प्रकारे ते विमान पाडणे, त्या वेळी शक्य नव्हते.. आणि सरळ आपल्या अंगावर धावून येत असलेल्या या मृत्यूला पाहून त्या पाकी विमानाच्या वैमानिकाने पॅराशूटमधून सरळ खाली उडी मारली! स्क्वाड्रन लीडर देवय्या आपले विमान घेऊन सरळ त्या विमानावर वेगाने आदळले!! त्याही परिस्थितीत त्यांच्या चेहेऱ्यावर विजयाची स्मितरेषा नक्की चमकली असेल, याची मला पूर्ण खात्री आहे..

आपल्या परतलेल्या सातही वैमानिकांना युद्ध समाप्तीनंतर वीर चक्राने सन्मानित करण्यात आले. परंतु स्क्वाड्रन लीडर देवय्या यांचा काहीच ठाव ठिकाणा लागत नव्हता. त्यांना बहुधा अपघात होऊन त्यांचे विमान पाकिस्तानात पडले किंवा पाडले गेले असावे आणि त्यांना युद्धकैदी बनविले गेले असावे, असे भारतातील वायुदलाच्या क्षेत्रात समजले जात होते.

परंतु जवळपास बावीस वर्षांनी एका पुस्तकामुळे देवय्यांचा हा पराक्रम उजेडात आला. ब्रिटिश लेखक जॉन फ्रिकर यांना पाकिस्तानने १९६५च्या युद्धाचा अभ्यास करण्यासाठी बोलाविले, तेव्हा त्यांनी केलेल्या संशोधनात सत्य उलगडले. आपल्यामागून आपला पाठलाग होतोय आणि जर हा संभाव्य हल्ला आपण रोखला नाही तर आपला सर्वांचा विनाश आहे हे ओळखून ते मागे फिरले आणि त्यांनी ते अजस्त्र एफ १०४ स्टार फायटर अंगावर घेतले! याला विमानयुद्धाच्या भाषेत ‘बुल फाईट’ म्हणतात. आणि यात आपल्या चिरकूट विमानाने एफ १०४ पाडले.. हे प्रचंड आश्चर्य!! हा आश्चर्याचा धक्का हे विमान बनविणाऱ्या त्या लॉकहिड मार्टिन कंपनीलाही बसला. त्यांनी या घटनेचा समग्र अभ्यास केला आणि आपल्या विमानात नंतर सुधारणा केल्या! 

स्क्वाड्रन लीडर देवय्या यांचा हा भीमपराक्रम समजायला आपल्याला बावीस वर्षे लागली. मात्र आपल्या सरकारने त्या नंतर त्यांना तेवीस वर्षानंतर ‘मरणोत्तर महावीर चक्र’ देऊन त्यांचा उचित सन्मान केला. महावीर चक्र हा युद्ध काळातील परमवीर चक्राच्या खालोखालचा सन्मान आहे!! देशाच्या इतिहासात मरणोत्तर महावीर चक्र प्राप्त करणारे एकमेव नाव आहे – – 

– – स्क्वाड्रन लीडर देवय्या!! 

ही आहे कहाणी स्क्वाड्रन लीडर देवय्या या शूर सैनिकाची! भारतमातेच्या या थोर सुपुत्राची.

आज ही कहाणी ज्ञात होण्याचे कारण म्हणजे श्री. अक्षयकुमार यांचा आजच पाहिलेला ‘स्काय फोर्स’ हा अप्रतिम चित्रपट.. संपूर्ण चित्रपटभर आपला ऊर अभिमानाने भरून येतो. तर कधी देवय्याजी आणि त्यांच्या सोबत्यांच्या कहाणीने डोळ्यांतून अखंड अश्रू वाहतात. त्या वेळच्या सैन्यदलांच्या अवस्थेने मन विषण्ण होते. आपल्या सरकारच्या बेफिकीरीमुळे आपल्या सैनिकांच्या निष्कारण होणाऱ्या मृत्यूंमुळे मन हळहळते..

तर मंडळी, एकदा चित्रपटगृहात जाऊन हा देशप्रेमाचा.. स्क्वाड्रन लीडर देवय्या या शूर सैनिकाची, भारतमातेच्या या थोर सुपुत्राची कहाणी सांगणारा हा चित्रपट जरूर पहा.. !! 

लेखक : श्री सुनील कुळकर्णी

तळे, पुणे

लेखक : श्री विनीत वर्तक ( माहिती स्त्रोत :- गुगल, नासा )

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “केंद्रीय उत्पाद शुल्क दिवस ( Central Excise Duty Day )” – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “केंद्रीय उत्पाद शुल्क दिवस (Central Excise Duty Day)” – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

भारतामध्ये केंद्रीय उत्पाद शुल्क दिवस दरवर्षी 24 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यक्षमतेचा गौरव करण्यासाठी आणि देशाच्या आर्थिक प्रगतीतील त्यांच्या योगदानाची जाणीव करून देण्यासाठी साजरा केला जातो.

केंद्रीय उत्पादन शुल्क हा सरकारसाठी महत्त्वाचा कर स्त्रोत आहे. हा कर उत्पादन प्रक्रियेदरम्यान वस्तूंवर आकारला जातो आणि नंतर तो अंतिम ग्राहकांपर्यंत पोहोचतो. भारत सरकारने 1944 मध्ये केंद्रीय उत्पादन शुल्क कायदा लागू केला होता, जो कर प्रणाली सुलभ आणि प्रभावी बनवण्यासाठी महत्त्वाचा ठरला.

या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे करदात्यांमध्ये जागृती निर्माण करणे, प्रशासन अधिक पारदर्शक बनवणे आणि राजस्व संकलन प्रक्रियेत सुधारणा करणे.

माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘श्रीमत् दासबोध – रामबाण औषधांचे परिपूर्ण दालन’ – लेखक : श्री वीरेंद्र ताटके ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

श्रीमत् दासबोध – रामबाण औषधांचे परिपूर्ण दालन’ – लेखक : श्री वीरेंद्र ताटके ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

औषधाच्या दुकानात हजारो औषधे असतात. त्यापैकी प्रत्येक औषध गुणकारी असतं पण प्रत्येक औषध प्रत्येकाला उपयोगी असेलच असं नाही. आपल्याला कोणता त्रास होता आहे त्याप्रमाणे आपल्याला औषध घ्यावे लागते.

समर्थ रामदास स्वामी रचित श्रीमत दासबोध हे असंच एक ‘रामबाण’ औषधाचे दालन आहे. आपल्याला झालेल्या भवरोगांवर इथे औषधे मिळतात.

या औषधाच्या दालनात औषधांचे वीस विभाग आहेत ( या विभागांना ‘दशक’ म्हटले जाते ) तर प्रत्येक विभागात प्रत्येकी दहा उपविभाग आहेत ( या उपविभागांना ‘समास’ म्हणतात ). यातील प्रत्येक औषध हे अत्यंत गुणकारी आहे. पण आधी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक औषध लगेचच लागू पडेल असे नाही.

मात्र सध्याच्या काळात सर्व वयोगटात हमखास आढळणाऱ्या काही आजारांवर पुढील रामबाण औषधे या दालनात मिळतात. इच्छुकांनी त्याचा उपयोग करून घ्यावा.

१ ) आजाराचे लक्षण – छोट्याछोट्या गोष्टींचा गर्व होणे

औषध – मूर्ख लक्षण 

औषध मिळण्याचे ठिकाण – दशक दुसरा समास पहिला 

२ ) आजाराचे लक्षण – तुटपुंज्या ज्ञानाचा आणि हुशारीचा अभिमान वाटणे 

औषध – पढतमूर्ख लक्षण 

औषध मिळण्याचे ठिकाण – दशक दुसरा समास क्रमांक दहा

३ ) आजाराचे लक्षण – आपल्या कुटुंबाचा गर्व वाटणे 

औषध – स्वगुणपरीक्षा 

औषध मिळण्याचे ठिकाण – दशक तिसरा समास क्र. दोन ते पाच 

४ ) आजाराचे लक्षण – स्वतःला अमर समजणे 

औषध – मृत्यूनिरूपण 

औषध मिळण्याचे ठिकाण – दशक तिसरा समास क्रमांक नऊ 

५ ) आजाराचे लक्षण – स्वतःविषयी अज्ञान

औषध – बद्धलक्षण 

औषध मिळण्याचे ठिकाण – दशक पाचवा समास क्रमांक सात.

६ )आजाराचे लक्षण – अत्यंत स्वार्थीपणा 

औषध – निस्पृहलक्षण

औषध मिळण्याचे ठिकाण – दशक करावा समास क्रमांक दहा 

७ ) आजाराचे लक्षण – आयुष्यात प्रगती कशी करावी हे न कळणे 

औषध – सर्वज्ञसंग निरूपण

औषध मिळण्याचे ठिकाण – दशकअठरावा समास दुसरा 

८ ) आजाराचे लक्षण – करंटेपणा 

औषध – करंटपरीक्षा निरूपण

औषध मिळण्याचे ठिकाण – दशक अठरावा समास क्रमांक पाच

९ ) आजाराचे लक्षण – आधुनिक जगात कसे वागावे न कळणे

औषध – दशक नववा

औषध मिळण्याचे ठिकाण – संपूर्ण दशक नववा ( समास क्रमांक एक ते दहा ) 

१० ) ग्रंथाची संक्षिप्त माहिती मिळण्याचे ठिकाण : 

दशक पहिला समास पहिला 

हे सर्व करत असताना ‘ तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे ‘ ही प्रार्थना समर्थांना करावीच, जेणेकरून “मला दासबोध कळला “ असा गर्व होऊन त्यातील औषधांचा ‘ साईड इफेक्ट’ होत नाही.

लेखक : श्री वीरेंद्र ताटके

पुणे फोन ९२२५५११६७४

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जागतिक मातृभाषा दिन… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

सुश्री अपर्णा परांजपे

? इंद्रधनुष्य ?

☆ ✍️ जागतिक मातृभाषा दिन… ☆ सुश्री अपर्णा परांजपे

जागतिक मातृभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

प्रगल्भ अशी आपली मातृभाषा मराठीचा आपल्याला अभिमान आहे.

ॐ‌ हे अक्षरब्रह्म आहे यातूनच शब्द निर्माण झालेत. आधी शब्द मग वाक्य वाक्य: संपूर्ण वाक्याचा सरळ अर्थ समजणे ही प्रक्रिया असते. जेवढं लिहिलंय, वाचलंय त्याचा सरलार्थ समजणे.

महावाक्य: ज्ञानी व अनुभवी व्यक्तींच्या तोंडून बाहेर पडलेल्या शब्दांचा, वाक्यांचा अर्थ जरी समजला नाही तरीही त्यांच्याच कृपेने त्याची अनुभूती घेणे ! 

विज्ञान एक प्रमेय व त्याची सिध्दता देते, तद्वतच ऋषिंचे शब्द म्हणजे त्या शब्दांची सिध्दता असते.

“आपुल्या सारखे करिती तात्काळ”

हे वचन सिध्द आहे कारण ते स्वानुभवातून आलेले आहे.

नुसती कल्पना जरी करता आली या वचनांची तरीही समाधान वाटते.

“मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेषजे गुरौ यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवति तादृशी”

जशी आपली भावना व भाव असेल तसा अनुभव येतो कारण सिध्द केल्याशिवाय प्रमेयाला अर्थ नाही.

संगत्याग आणि निवेदन| विदेहस्थिती अलिप्तपण|

सहजस्थिती उन्मनी विज्ञान| हे सप्तही येकरूप. .

(||४:५:८|| दासबोध)

यातील प्रत्येक वाक्य समजू शकते पण ते महावाक्य असल्याने त्याचा अनुभव घेणे कल्याणकारी आहे.

असे स्वानुभवी सत्पुरुष भक्ताला स्वतः सारखे करतात ह्यावर निरपेक्ष श्रध्दा म्हणजे ॐ या अक्षरब्रह्माला हृदयात साठवणे व त्याचा आनंद घेणे आहे.

अशी ही मराठी जिला मातेचा दर्जा आहे ती लेकराला तिच्या जवळ जे जे आहे ते प्रदान करण्यास तत्पर असते व आपले बालक आपल्यापेक्षाही सुखी व्हावे असा बहुमोल आशीर्वाद ही देते! 

एकदा का मनाला हे पटले की काम झाले ह्यात शंका नाही.

भगवंत हृदयस्थ आहे 🙏

© सुश्री अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘श्रीसमर्थ रामदास पुण्यतिथी…. अर्थात दासनवमी’…भाग -२ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘श्रीसमर्थ रामदास पुण्यतिथी…. अर्थात दासनवमी’…भाग -२ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

“शक्तीने मिळती राज्ये | युक्तीने येत्न होतसे |l शक्ती युक्ती जये ठाई | तेथे श्रीमंत धावती ||३०||”

अध्यात्म सार. – समर्थ रामदास

या उक्तीनुसार स्वतः शक्ती सामर्थ्य कमविणे गरजेचे वाटले म्हणून हा मुलगा आपल्या घरापासून कोसोमैल दूर असलेल्या टाकळीला गेला. टाकळीत पाय ठेवलेल्या दिवसापासून त्याच्या तपश्चर्येला सुरुवात झाली. ‘केल्याने होत आहे रे आधी या केलेची पाहिजे, नव्हे ! आपणच केले पाहिजे’ असे ठरवून त्याने स्वतः रोज सुमारे हजार सूर्यनमस्कार, नंतर सद्ग्रंथाचे वाचन, चिंतन, भिक्षेच्या निमित्ताने समाजमनाचे सूक्ष्म अवलोकन, असे विविध उपक्रम चालू केले.

साधारण बारा वर्षांनी साधनेचा अर्थात जीवीतकार्याच्या पूर्वतयारीचा एक टप्पा पूर्ण केल्यावर हा तरुण देशाटन करण्याकरिता टाकळीतून बाहेर पडला. अंदाजे चोवीस वर्षाचे वय. स्वयंप्रेरित होऊन स्वतःहून निवडलेला एका अर्थाने जगावेगळं संकल्प !!

 “बहुत लोक मेळवावे| एक विचारे भरावे| कष्ट करोनी घसरावे| म्लेंच्छांवरी||१४||” (श्रीसमर्थांचे संभाजी राजांना पत्र) 

हा एकमेव उद्देश मनात ठेऊन संपूर्ण देशभर प्रवास केला. या मुलाने भारताच्या कानाकोपऱ्यात प्रवास करून देश काल परिस्थितीचा अभ्यास केला आणि तो या अनुमानापर्यंत पोचला की आपल्याकडे भारतात कसलीच कमतरता नाही. कमतरता एकाच गोष्टीची आहे ती म्हणजे असलेल्या साधनसंपत्तीचा उपयोग करुन, नीट योजना करून कार्य सिद्धीस नेणाऱ्या ‘योजकाची’. एका शब्दात सांगायचे तर संघटनेची आणि सक्षम, लोकोत्तर नेतृत्वाची. हिंदू मनुष्य पराक्रमात, सामर्थ्यात कुठेच कमी नव्हता. कमतरता एकाच गोष्टीत होती ती म्हणजे ‘मी जिंकू शकतो’ या वृत्तीची. आणि सर्वात महत्वाचा अभाव होता ‘राष्ट्रीय’ दृष्टिकोनाचा!! संघटनेच्या माध्यमातून समाज आपल्याला हवे ते सर्व करू शकतो हे सिद्ध करण्याची गरज होती. बारा वर्षांच्या देशाटनात श्रीसमर्थानी अशी हुकमी माणसे हेरून देशाच्या विविध भागात शेकडो मठ स्थापन केले. प्रत्येक मठात महंत नेमून मुख्य हनुमान भक्ती आणि बलोपासना ही कार्य सांगितलीच, पण सामान्य मनुष्यात स्वाभिमान जागृत करण्याचे महत्कार्य या तरुणांकरवी करायला सुरुवात केली.

“मुख्य हरिकथा निरुपण। दुसरे ते राजकारण।। तिसरे ते सावधपण। सर्वा विषई।।” ( दा. ११. ०५. ०४)

त्या काळात दळणवळणाची अल्पस्वल्प साधने असताना देखील या सर्व मठातील संपर्क, सुसंवाद आणि सुसूत्रता उत्तम होती. याचा उपयोग छत्रपतींना ‘स्वराज्य’ संस्थापनेसाठी झाला हे सर्वज्ञात आहे. अलौकिक जीवनदृष्टीने कार्य करणाऱ्या आणि आपल्या असामान्य कर्तृत्वाने समाजाला दिशा देणाऱ्या या तरुणास समाजाने उस्फूर्तपणे ‘समर्थ’ ही उपाधी बहाल केली. रोज हजार सूर्यनमस्कार घालणारा आणि प्रचलित पद्धतीने मठ स्थापन करुन राजाश्रयावर मठ न चालविणारा हा आगळा संत लोकांना आकर्षित करीत होता. तरुण पिढी हनुमान आणि बलोपासनेमुळे धष्टपुष्ट होत होती आणि संकुचित विचार सोडून समाजाचा म्हणजेच समष्टीचा विचार अंगी बाणवत होती.

छत्रपतींनी स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला हे खरेच. पण कोणीही एकटा मनुष्य राज्य तोपर्यंत निर्माण करू शकत नाही, जोपर्यंत तत्कालीन समाज ते मनापासून स्वीकारीत नाही. राज्य व्हावे ही श्रींची इच्छा !! ह्या उद्गारांना विशेष मूल्य नक्कीच आहे. पण हे वाक्य त्याकाळातील समाजातील प्रत्येक मनुष्याचे ‘ब्रीदवाक्य’ झाले होते, याचीही आपण दखल घेतली पाहिजे. जेव्हा समाज एका विशिष्ठ ध्येयाने प्रेरित होतो तेंव्हाच शिवाजी महाराजांसारखे असामान्य नेतृत्व आणि कर्तृत्व घडते. शिवाजी महाराजांचे भौगोलिक साम्राज्य आजच्या दोन-तीन जिल्ह्याइतके मर्यादित असले तरी भावनिकरित्या ते राज्य इथे राहणाऱ्या प्रत्येक मावळ्याचे होते. दिल्लीश्वराने स्वराज्य बुडविण्याचे अनेक प्रयत्न केले पण त्याला त्यात कधीही यश मिळाले नाही. शेवटी त्याला स्वतःला दिल्ली सोडून महाराष्ट्रात यावे लागले आणि स्वतःला इथेच गाडून घ्यावे लागले तरीही स्वराज्य जिंकणे त्यास शक्य झाले नाही. ह्याला एकमेव कारण म्हणजे छत्रपतींच्या मागे असलेली समाजाची सात्विक शक्ती आणि विजिगीषू वृत्ती. ही वृत्ती प्रज्वलीत करण्याचे काम ह्या मठातून अखंड चालू राहिले.

त्या काळात युद्ध होतं होतीच, माणसे मरत होती, मारीत होती, जगत होती. फक्त कशासाठी जगायचे ? कशासाठी मरायचे ? कशासाठी मारायचे? हे सांगणार कोणी नव्हते. ते सांगण्याचे काम कोणी केले असेल तर त्या समर्थांनी. ह्यामुळेच जिवा महाला, बाजीप्रभू तानाजी, येसाजी मरायला तयार झाले. हे जेव्हा मरायला तयार झाले तेव्हा त्यांची पत्नी विधवा होणारच होती, त्यांच्या मुलांचे पितृछत्र हरपणारच होते. पण त्यांनी आपल्या कुटुंबापुरता संकुचित विचार न करता देशाचा, थोडक्यात कर्तव्याचा विचार केला आणि ही शिकवण समर्थांमुळेच शक्य झाली.

आपण संकल्पित केलेलं कार्य ‘याचि देही याचि डोळा’ पाहायला मिळण्याचे भाग्य फार थोड्या लोकांना मिळते. श्रीसमर्थ रामदास स्वामी या बाबतीत भाग्यवान ठरले. श्रीसमर्थांच्या चरित्राचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की श्रीसमर्थ कर्मयोगी होते. शके १७५२ (इसवीसन 1674) ला शिवछत्रपतींचा राज्याभिषेक झाला. हिंदूना सार्वभौम राजा मिळाला. सुमारे सातशे वर्षांची गुलामी नष्ट झाली. ही फक्त राजकीय गुलामी नव्हती तर सांस्कृतिक गुलामी देखील होती. छत्रपतींनी ही गुलामी झिडकारून टाकली आणि नवी हिंदू राज्यव्यवस्था निर्माण केली. अनेक बाटलेल्या हिंदूंना त्यांनी नवीन विधिविधान निर्माण करुन शुद्धीकरण करुन स्वधर्मात घेतले. छत्रपतींनी समर्थाना आपले गुरु मानले होते. सद्गुरुंची सेवा घडावी म्हणून शिवाजी महाराजांनी आपले सर्व राज्य समर्थांच्या झोळीत टाकले आणि समर्थानी निःस्पृहपणे ते परत देऊन टाकले. त्याकाळात आणि आजही असा संत महात्मा बघायला मिळणे अति दुर्मिळ! अशा या समर्थांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर ‘आनंदवनभुवनी’ हे काव्य लिहिले.

“उदंड जाहले पाणी, स्नान संध्या करायला।”

एका सामान्य कुटुंबातील मुलगा मनाशी संकल्प करून प्रतिकूल परिस्थिती असतानाही स्वतःच्या बुद्धिकौशल्याचा उपयोग करून, रामावर प्रचंड श्रद्धा ठेवून सामान्य मनुष्यातील सात्विक शक्तीचे जागरण करून हिंदू सिंहासन निर्माण करु शकतो. हे मराठवाड्यातील जांब गावच्या ठोसरांच्या नारायणाने सिध्द करून दाखविले. फक्त त्यासाठी त्याला ‘नारायणा’चे ‘रामदास’ व्हावे लागले. ‘नारायण ठोसर ते समर्थ रामदास’ हा प्रवास विलक्षण आहे, तो मुळातून अभ्यासायला हवा, खास करून तरूणांनी! आजची समाजाची परिस्थिती फार वेगळी आहे असे नाही. ‘संघशक्ती कलींयुगे’ हेच खरे.

दासनवमी म्हणजे श्रीसमर्थांचा निर्वाणदिन. संत सूक्ष्मातून जास्त कार्य करतात असे म्हटले जाते. धर्मजागृती चे त्यांचे कार्य चालू असेलच, त्याला आपला हातभार कसा लागेल याचा विचार आपण सर्वांनी करावा असे नम्रपणे सुचवावेसे वाटते. बलोपासना आणि सगुणभक्ती या दोन गोष्टी सर्वांनी कराव्यात असा त्याचा प्रयत्न असे. प्रयत्न, विवेक आणि वैराग्य अशी त्यांची त्रिसूत्री होती. आजच्या पावनदिनी आपण सर्वांनी त्यांच्या चरित्राचे चिंतन करावे, रामनाम स्मरण करावे आणि राष्ट्रीय विचारसरणीने कार्य करणाऱ्या एखाद्या संघटनेत सक्रीय सहभागी व्हावे. *’समर्थ’ होण्याचा प्रयत्न जरूर करावा पण त्यासाठी आधी ‘दास’ होऊन दाखवावे. आपण प्रयत्न करू.

जय जय रघुवीर समर्थ।

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘श्रीसमर्थ रामदास पुण्यतिथी…. अर्थात दासनवमी’…भाग -१ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘श्रीसमर्थ रामदास पुण्यतिथी…. अर्थात दासनवमी’…भाग -१ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

इसवी सनाचे सतरावे शतक. तो काळ ‘मोगलाई’चा. ‘दहशतवाद’, ‘असहिष्णुता’ हे शब्द एखादवेळेस त्या काळातील शब्दकोषात देखिल नसतील, पण सामान्य मनुष्य ‘याचि देही याचि डोळा’ ते अनुभवत होता. सुलतानी आणि अस्मानी संकट एकाच वेळेला महाराष्ट्रावर आणि एकूणच भारतावर घिरट्या घालीत होते. ‘स्वधर्म’ नावाचा काही धर्म असतो आणि तो प्राणपणाने जगायचा, जपायचा असतो हे सांगण्याचे धाडस करण्याची तयारी देखील त्या काळात फार कमी लोकांची होती. एखादया भरलेल्या शेतात टोळधाड यावी आणि काही क्षणांत ते शेत फस्त करून टाकावे, अगदी अशाच पद्धतीने मोगल आणि इतर आक्रमक गावावर हल्ला करायचे आणि सोन नाणं लुटून न्यायाचेच, पण गावातील लेकीबाळी एकतर पळवून न्यायचे किंवा ‘नासवून’ टाकायचे. जनतेनं दाद मागायची कोणाकडे? कारण हिंदूंना राजा नव्हताच. काही सरदार होते, पण तेही बादशहाचे मांडलिक. त्यामुळे तेही वतने टिकविण्यासाठी आपल्याच लोकांशी भांडत होते. ब्राह्मण आपल्या कर्मकांडात गुंतले होते, क्षत्रिय तत्कालीन राज्य व्यवस्थेचे मांडलिक झाले होते. वैश्य जीव मुठीत धरून व्यापार करीत होते आणि तथाकथित शूद्र आपापले जीवन कसेतरी जगत होते. काहीही करून फक्त जीव वाचविणे हाच हाच त्याकाळातील जगण्याचा मूलमंत्र झाला होता. या सगळ्याचे वर्णन करण्यासाठी एकच सुयोग्य शब्द आहे ‘मोगलाई’

इसवीसनाच्या तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माची पताका हातात घेतली आणि भक्तिमार्गाच्या माध्यमातून सामान्य मनुष्यात प्राण ओतण्याचे, त्याच्यातील ‘स्व’त्व जागृत करण्याचे कार्य चालू केले. त्या काळात समाजातील सात्विकता जवळ जवळ नष्ट होत चालली होती. चांगुल्यावरील सामान्य जनतेचा विश्वास उरला नव्हता. त्याकाळात मनुष्याचा चांगुलपणा वरील विश्वास निर्माण करणे आणि तो टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे होते. सर्व संतांनी अगदी तेच केले. दुष्काळ पडला तर शेतकरी सर्वप्रथम आपले बियाणे सुरक्षित ठेवतो याच सुत्राप्रमाणे माऊलींनी आणि नंतर तत्कालीन संतांनी समाजातील सात्विकतेच्या बीजाचे संरक्षण आणि संवर्धन केले. माऊलींचा हरिपाठ, संत एकनाथांचे भारूड आणि इतर संताचे अभंग यामुळे समाजमन भक्तिरसात न्हाऊन निघत होते आणि ईश्वराच्या, नामाच्या सान्निध्याने मनुष्यातील सत्वगुण वृद्धीगंत व्हायला बळ मिळत होते. मनुष्याच मन विकसित करणे, हे फार अवघड काम. त्याहून अवघड म्हणजे निद्रिस्त समाजाला जागृत करून त्यास विशिष्ठ ध्येयाने प्रेरीत करून राष्ट्रकार्य, समाजकार्य करण्यास प्रवृत्त करणे. अर्थात, हे काम हृदयाच्या शस्त्रक्रियेसारखे. माणूस जिवंत ठेऊन जुनं म्हणजे सडलेले हृदय बदलून तिथे नवीन हृदयाचे रोपण करायचे. खरे हृदय बदलणे त्यामानाने एकवेळ सोपे म्हणता येईल, पण मनुष्याचे विचार समूळ बदलणे हे गोवर्धन पर्वत उचलण्यापेक्षा महाकठीण. पण आपल्याकडील संत मंडळी हे उत्तम मानसशास्त्रज्ञ, त्यामुळे त्यांनी ही सर्व शस्त्रक्रिया बेमालुमपणे आणि निष्णात तंत्रज्ञाप्रमाणे पार पाडली. ही शस्त्रक्रिया झाल्याचे सामान्य मनुष्याला कळलेदेखील नाही, पण त्याचा ‘रोग’ मात्र बरा होण्यास निश्चित मदत झाली असे खात्रीने म्हणता येईल.

“जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति । देह कष्टविती उपकारें ॥२॥” (संदर्भ:- अभंग क्रमांक १०१४ सार्थ श्रीतुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था) म्हणतात ते उगीच नव्हे!

मराठवाड्यातील जांब गावातील एका घरात एका मुलाचा जन्म झाला. अर्थात मुलाचा जन्म होणे ही तशी सामान्य घटना. पण त्याच मुलाने पुढील काळात आपल्या असामान्य कर्तृत्वाने आपले आपल्या गावाचे, प्रांताचे नव्हे तर देशाचे नाव जगप्रसिद्ध केले, इतकेच नव्हे तर आज चारशे वर्षांनंतरही ते नाव एक दीपस्तंभ बनून आजच्या पिढीला मार्गदर्शन करीत आहे. माझ्यासारख्या एका अर्थाने आजच्या तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्यास त्यांच्या चरित्राचे स्मरण करावेसे वाटते, त्याचे कर्तृत्व पुन्हा एकदा समाजाला सांगावेसे वाटते, यातच त्यांच्या अलौकिक आणि अपौरुषेय कार्याचे महात्म्य दडले आहे.

घरात अनेक पिढ्या चालत आलेली रामभक्ती !! मोठे बंधु त्यामानाने ज्येष्ठच. त्यामुळे हा बाळ आपल्या बालमित्रमंडळीत जास्त रमायचा. सुरपारंब्या आणि इतर तत्कालीन खेळ हे वेळ घालविण्याचे साधन. थोडा मोठा झाल्यानंतर मात्र सूर्यनमस्कार, पोहणे अशा गोष्टीत त्यास रस वाटू लागला. एकीकडे रामभक्ती चालू होतीच. आठव्या वर्षी मुंज झाली आणि अचानक वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या आकस्मिक निधनाचा बाळाच्या मनावर खोल परिणाम झाला. बाळ अंतर्मुख झाला. त्याचवेळेस गावात टोळधाड आली, समाजाची विदारक परिस्थिती त्याच्या लक्षात आली आणि या अंतर्मुखतेस एक वेगळी दिशा मिळाली. त्याच्या जीवनाचे ध्येय निश्चित झाले.

“धर्माच्या करिता आम्हांस जगती रामाने धाडियले।” 

रामकार्य करण्याचे ठरले आणि हनुमंत त्यांचा आदर्श, मार्गदर्शक आणि मित्र झाला. जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी हनुमंताला आपल्या सोबत ठेवले. प्रत्येक गोष्ट हनुमंताला साक्षी ठेऊन आणि समर्पण करून केली. आयुष्यात परमेश्वरावरील अतूट श्रद्धा आणि शुद्ध साक्षीभाव किती काम करतो याचे हे मूर्तिमंत उदाहरण !! आयुष्याचे ध्येय ठरले, निश्चय दृढ झाला, आता कृती !! सामान्य मनुष्याचे असामान्य संकल्प आईच्या अश्रूत वाहून जातात असा आपल्याकडील अनेक लोकांचा अनुभव आहे. ‘हुंडा मला नकोय पण आईसाठी घेतोय’, मला काही नकोय मात्र आईची इच्छा मोडवत नाही’, आई हो म्हणाली असती तर मी सैन्यात भरती झालो असतो, अशी ‘कारणे’ देणारी मंडळी आज देखील आपल्या अवतीभवती पाहायला मिळतात. पण याचे ध्येय पक्के होते, विशाल होते. ध्येय ‘रामराज्य’ प्रत्यक्षात आणण्याचे होते. हिंदूंना स्वतःचे सार्वभौम सिंहासन मिळावे, हिंदूसमाज जिंकू शकतो, हिंदू मनुष्य सार्वभौम राजा होऊ शकतो, इतकेच नव्हे हिंदू राजे जिंकलेल्या राज्याचा विस्तार करु शकतात, हिंदू ‘राज्य’ करु शकतात, हिंदू कारखाने चालवू शकतात, व्यापार करू शकतात, समुद्रावर सत्ता गाजवू शकतात, गडकिल्ले बांधू शकतात, शेती विकसित करू शकतात, हे दाखवून देण्याचा निश्चय झाला होता, आता हा संकल्प फक्त प्रत्यक्षात आणायचा होता. एका वाक्यात सांगायचे तर *सामान्य मनुष्यात ‘राष्ट्रभक्ती’, ‘राष्ट्रीय दृष्टीकोन’ राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करण्याचे काम करायचे होते.

जगात कोणतीही गोष्ट दोनदा घडते. एकदा कोणाच्या तरी मनात आणि नंतर प्रत्यक्षात! हा संकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी पारंपरिक पद्धतीने संसारात रमणे सोयीचे नव्हते, म्हणून आईच्या शब्दांसाठी बोहल्यावर चढलेला हा मुलगा, “शुभमंगल सावधान…. ” ऐकताच ‘सावधान’ झाला आणि गोरजमुहूर्ताचा फायदा घेऊन बोहल्यावरून पळून गेला. त्याला पारंपरिक संसारात न अडकता विश्वाचा संसार करायचा होता. “चिंता करतो विश्वाची”, असा विचार करणाऱ्या मुलाला ‘विश्वाची चिंता करायची म्हणजे काय करायचे असते हे समाजाला दाखवून द्यायचे होते आणि तसे करण्यासाठी हजारो तरुणांना तयार करायचे होते, तसेच त्यांची संघटना बांधून पुढेही अशी व्यवस्था चालू राहील याची रचना करायची होती.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १८ — मोक्षसंन्यासयोगः — (श्लोक ६१ ते ७०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १८ — मोक्षसंन्यासयोगः — (श्लोक ६१ ते ७०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति । 

भ्रामयन्सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ॥ ६१ ॥ 

*

सकल चरांचा देह यंत्र आत्म्याचे 

सुकृतानुसार कर्म करुनी घ्यायाचे

ईश्वरमाया चालविते कायायंत्राला

हृदयी तो स्थित राही कर्म करायाला ॥६१॥

*

तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत । 

तत्प्रसादात्परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्‌ ॥ ६२ ॥

*

सर्वभावाने शरणागत परमेशा होई

तया कृपेने परम शांती स्थान प्राप्त होई ॥६२॥ 

*

इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्‍गुह्यतरं मया । 

विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु ॥ ६३ ॥ 

*

गुह्यात गुह्यतम श्रेष्ठ ज्ञान कथिले पार्था मी तुजला

विचार अन्ती कर्म करावे स्वीकार जे तव इच्छेला ॥६३॥

*

सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः । 

इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्‌ ॥ ६४ ॥ 

*

तू मजसि अतिप्रिय यास्तव हितवचन मी सांगेन तुला

गुह्यतम सकल ज्ञानामधील परम रहस्य कथितो तुजला ॥६४॥

*

मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु । 

मामेवैष्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे ॥ ६५ ॥ 

*

माझ्याठायी गुंतवुनी मन भक्त अनन्य होई तू माझा

पूजन करी मम प्रणाम करी मज जन्म धन्य हो तुझा

करशील याने प्राप्त मजला सत्य आहे माझे वचन

अतिप्रिय मजला तू असशी जाणौन घेई हे अर्जुन ॥६५॥

*

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज । 

अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ॥ ६६ ॥ 

*

धर्म सर्व त्यागूनीया तू केवळ मज येई शरण

शोकमुक्त हो पापमुक्त करुनी मोक्ष तुला मी देईन ॥६६॥

*

इदं ते नातपस्काय नाभक्ताय कदाचन । 

न चाशुश्रूषवे वाच्यं न च मां योऽभ्यसूयति ॥ ६७ ॥ 

*

अभक्त असुनी तपरहित जो त्यास ज्ञान हे देउ नको

मनी ज्यास ना ऐकायाचे त्यास शास्त्र हे कथू नको

अनिष्ट दृष्टी माझ्या ठायी त्यास कदापि बोलू नको

अपात्र तयासी दिव्य ज्ञान हे पार्था कधिही देऊ नको ॥६७॥

*

य इमं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति । 

भक्तिं मयि परां कृत्वा मामेवैष्यत्यसंशयः ॥ ६८ ॥ 

*

परमभक्त माझा कथील गीतारहस्य मद्भक्तांसी

वचन माझे माझी प्राप्ती निःसंशये होईल तयासी ॥६८॥

*

न च तस्मान्मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः । 

भविता न च मे तस्मादन्यः प्रियतरो भुवि ॥ ६९ ॥ 

*

कार्यमग्न मम प्रिय कार्ये तो श्रेष्ठ अखिल जगती

तयापरीस मज अधिक कोणी प्रिय ना या जगती ॥६९॥

*

अध्येष्यते च य इमं धर्म्यं संवादमावयोः । 

ज्ञानयज्ञेन तेनाहमिष्टः स्यामिति मे मतिः ॥ ७० ॥ 

*

धार्मिक गीताशास्त्र संवाद उभयांमधील आपुला

श्रद्धेने जो पठण करील पोहचेल कार्य मजला

यज्ञाद्वारे ज्ञानाच्या लाभेल तयाची अर्चना मला

घोषित करितो मी धनंजया होईन प्राप्त मी तयाला ॥७०॥ 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘कविराज भूषण…’  (उत्तरार्ध) – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘कविराज भूषण…’  – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव

(उत्तरार्ध)

नमस्कार मैत्रांनो, 

कविराज भूषण यांच्या जाज्वल्य देशप्रेमाने आणि शिवरायांविषयी असलेल्या अतीव आदराने रचलेल्या काव्याचे शिवराय आणि त्यांच्या समस्त दरबारी मंडळींना खूपच कौतुक होते. छत्रपतींनी या अभूतपूर्व काव्यरचना निव्वळ ऐकल्याच नाही तर या राजकवीचा वेळोवेळी उचित बिदागी सहित मानमरातब केला. बघू या त्यातीलच कांही निवडक काव्य रचना     

शिवरायांच्या युद्धांचे सजीव चित्रण: 

गनीमाशी शिवरायांच्या सेनेने केलेल्या घनघोर युद्धाचे सजीव वर्णन करतांना भूषण यांच्या लेखणीचे जणू टोकदार भाले होतात. शब्दांकन असे आहे जणू तोफेचे गोळे आग ओकताहेत. हे वीररसपूर्ण, जोमदार काव्य वाचतांना आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. युद्धाच्या उत्साहाने मुसमुसलेल्या सैन्याचे कूच, रणांगणात रणभेरीचा शंखनाद, शस्त्रांची चकमक, शूरवीरांचे मर्दानी शौर्य आणि भ्याडांची भयावह अवस्था इत्यादी दृश्यांचे चित्रण कवीने अतिशय प्रभावीपणे केले आहे. खालील काव्यांशात शिवाजी राजांच्या चतुरंगिणी सेनेच्या प्रस्थानाचे अत्यंत मनोहर चित्रण आहे. कविराज म्हणतात:

साजि चतुरंग बीररंग में तुरंग चढ़ि। सरजा सिवाजी जंग जीतन चलत है,

भूषन भनत नाद विहद नगारन के। नदी नद मद गैबरन के रलत हैं|

ऐल फैल खैल भैल खलक में गैल गैल, गाजन की ठेल-पेल सैल उसलत है,

तारा सों तरनि घूरि धरा में लगत जिमि, थारा पर पारा पारावार यों हलत है॥ 

अर्थ: ‘सर्जा’ या उपाधीने सुशोभित झालेले अत्यंत श्रेष्ठ आणि वीरवर शिवाजी राजे आपली चतुरंगिणी सेना (हत्ती, रथ, घोडदळ आणि पायदळ हे सैन्याचे चार विभाग असलेली सेना) सज्ज करून आणि शरीराच्या प्रत्येक अंगात उत्साह निर्माण करून युद्ध जिंकण्याची ईर्षा बाळगून होते. त्यावेळी ढोल-ताशे आणि नगारे गर्जत होते. शिवरायांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणात मदमस्त हत्ती होते आणि युद्धासाठी उत्तेजित झाल्यामुळे हत्तींच्या कर्णरंध्रातून अत्यधिक मद नदी-नाल्यांप्रमाणे वाहत होता.जगाच्या कानाकोपऱ्यात दहशत पसरली होती, कारण शिवाजीचे प्रचंड सैन्य सर्वत्र पसरले होते. हत्तींच्या धक्क्याने डोंगरही उन्मळून पडत होते. प्रचंड सैन्याच्या हालचालीमुळे बरीच धूळ उडत होती. अति धूळ उडल्यामुळे आकाशात चमकणारा सूर्य ताऱ्यासारखा दिसत होता आणि समुद्र ताटात ठेवलेल्या पाऱ्यासारखा थरथरत होता.

शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा अन भूषण यांची काव्यप्रतिभा:

आता वळू या कविराज भूषण यांच्या सर्वाधिक प्रसिद्ध अशा काव्य रचनेकडे! दिनांक ६ जून १६७४ ला छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ले रायगड येथे भव्य दिव्य राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. या एकमेवाद्वितीय राजसी सोहळ्याचे साद्यन्त आणि बारीक सारीक तपशिलांसह वर्णन अनेकानेक तऱ्हेने करण्यात आले आहे. या लेखाच्या विषयाला अनुषंगून आपण बघू या की कवी भूषण सिंहासनाधीश शिवरायांचे कसे ओजस्वी वर्णन करतात. हे हुबेहूब वर्णन वाचतांना कवीची सौंदर्यदृष्टी, उत्तुंग साहित्यिक आणि बौद्धिक भरारी बघून केवळ त्यांच्या काव्यप्रतिभेला त्रिवार मुजरा करावासा वाटतो. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हां सिंहासनावर आरूढ झाले, त्या प्रसंगी त्यांची स्तुती करताना कविराज भूषण यांनी पुढील छंदकाव्य राजदरबारात सादर केले होते. शिवाजी महाराजांच्या शौर्याचे वीररसाने भारलेले, उत्कट आणि मार्मिक वर्णन केवळ थोर कवी भूषण यांच्यासारखे त्यांचे मनस्वी प्रशंसकच करू शकत होते. एकापेक्षा वरचढ एक अशा सुंदर उपमालंकारांनी सजलेल्या आणि हिंदू संस्कृतीशी संबंधित प्राचीन संदर्भ देत, कवी रसमय वर्णन करतात की छत्रपती म्लेंच्छांवर कसे भारी पडले!  

इंद्र जिमि जंभ पर, बाढव सुअंभ पर, रावन सदंभ पर, रघुकुलराज है |

पौन बारिबाह पर संभु रतिनाह पर, ज्यों सहसबाह पर राम द्विजराज है |

दावा द्रुमदंड पर चीता मृगझुंड पर, भूषन वितुंड पर जैसे मृगराज है |

तेज तम अंस पर कान्ह जिमि कंस पर, त्यों मलिच्छ बंस पर सेर सिवराज है ||

अर्थ: ज्याप्रमाणे जंभासुरावर इंद्र, समुद्रावर वडवानल, रावणाच्या अहंकारावर रघुकुल राजा (श्रीराम), मेघांवर पवन, रतीचा पती म्हणजे कामदेवावर शंभू, सहस्त्रबाहू (कार्तवीर्य) वर ब्राह्मण राम अर्थात परशुराम, वृक्षांच्या खोडांवर दावानल, हरिणांच्या कळपावर चित्ता, हत्तीवर मृगराज (सिंह), तिमिरावर प्रकाशकिरण आणि कंसावर कृष्ण भारी पडतात आणि त्यांच्यावर आरूढ होतात, तसेच म्लेच्छ वंशावर शिवाजी व्याघ्रासमान भारी पडतात आणि त्यांच्यावर विजय प्राप्त करतात.    

छंदबद्ध आणि अलंकारिक काव्य

रसाळ परिपोषक असे अर्थपूर्ण छंदबद्ध काव्य रचतांना ते बहारदार तर होतेच, पण अतिरम्य गेय असे काव्य निर्माण झालेले दिसून येते. त्यांच्या काव्यात दोहा, कवित्त, सवैया, छप्पय इत्यादी तत्कालीन छंदांचा प्रामुख्याने उपयोग केल्या गेला आहे. रीतिकालीन कवींचे प्रमुख बलस्थान म्हणजे अलंकारिक भाषा! भूषण यांची काव्यसुंदरी एका पेक्षा एक आकर्षक अलंकारांनी सजलेली आहे. ते अपरिमित सौंदर्य बघतांना रसिक मुग्ध होतात. त्यांच्या काव्यात सर्वच अलंकारांची रेलचेल आहे. अर्थालंकारांपेक्षा शब्दालंकारांना प्राधान्य आहे. त्यांचे अतिशय प्रसिद्ध असे यमक अलंकारांनी नटलेले हे एक उदाहरण बघा!

ऊंचे घोर मंदर के अंदर रहन वारी, ऊंचे घोर मंदर के अंदर रहाती हैं।

कंद मूल भोग करैं कंद मूल भोग करैं, तीन बेर खातीं, ते वै तीन बेर खाती हैं। 

भूषन सिथिल अंग भूषन सिथिल अंग, बिजन डुलातीं ते वै बिजन डुलाती हैं।

‘भूषन’ भनत सिवराज बीर तेरे त्रास, नगन जड़ातीं ते वै नगन जड़ाती हैं॥

महत्वाचे शब्दार्थ 

(१) ऊंचे घोर मंदर – उंच विशाल महाल/उंच विशाल पर्वत 

(२) कंद मूल – राजघराण्यात खाल्ले जाणारे चविष्ट कंद-मूळ / जंगलातील कंद मुळे 

(३) तीन बेर खातीं – तीन वेळा खात होत्या/ तीन बोरे खातात 

(४) बिजन – पंखे/ एकाकी 

(५) नगन – नग – हिरे मोती इत्यादी रत्ने/ नग्न

कवीराज भूषण म्हणतात: “ज्या शत्रूंच्या स्त्रिया ज्या पूर्वी उंच-उंच-विशाल राजमंदिरांत राहत होत्या त्या आता शिवरायांच्या भीतीमुळे आणि आपला जीव वाचवण्यासाठी भयंकर पर्वतांच्या गुहेत लपून राहतात. ज्या महालातील स्वादिष्ट पदार्थ खात होत्या, त्या आता जंगलात भटकत जंगली कंद, मुळे आणि फळे खाऊन जगतात. जडजवाहिराने जड झालेल्या दागिन्यांच्या वजनामुळे ज्यांचे अंगप्रत्यंग शिथिल असायचे, त्यांचेच अंगांग आता भुकेने कासावीस होत आलेल्या अशक्तपणामुळे शिथिल झाले आहे. ज्या राजस्त्रियांवर शीतल पंखे डुलत असत, त्या आता निर्जन जंगलात एकट्या फिरतात. भूषण म्हणतात, एकेकाळी ज्या मुघल स्त्रिया अभिमानाने हिरे मोती अन विविध रत्न यांनी जडवलेले दागिने घालून मिरवीत असत, त्या आता वस्त्रहीन अवस्थेत हिवाळ्याच्या भीषण शीतकालात थर थर कापत असतात.

स्वाभिमानी महाकवि भूषण

शिवरायांच्या दरबारी रुजू असलेले महाकवि भूषण अत्यंत स्वाभिमानी होते. त्याचेच एक उदाहरण! एकदा दुसऱ्या राज्याचा एक राजा शिवरायांच्या दरबारी आला. कवींचे शिवराय आख्यान ऐकून तो खूपच प्रभावित झाला. तो भूषणला आग्रह करीत म्हणाला, ‘तुम्ही माझ्या दरबारात येऊन माझ्यावर प्रशंसात्मक काव्य करा.” कांही दिवसांनी भूषण त्या राजाच्या दरबारी गेले आणि त्या राजाच्या प्रशंसात्मक काव्यग्रंथातील कांही अंश त्यांनी वाचून दाखवले. सर्वांनी त्यांची स्तुती केली. तेव्हां तो अहंकारी राजा म्हणाला,”या तीन लाख सुवर्ण मुद्रा घ्या, इतके अधिक मानधन देणारा राजा या देशात तुम्हाला कुठेही भेटणार नाही.” भूषण त्याच्या अहंकाराने व्यथित होऊन गप्पच होते. राजा त्यांना म्हणाला, “याहून अधिक सुवर्णमुद्रा हव्या असतील तर तसे सांगा, मी देईन.” कविराजांनी ती सुवर्णमुद्रांनी भरलेली थैली राजाला परत केली आणि त्या गर्विष्ठ राजाला म्हणाले, “तुम्ही माझ्या काव्याची कदर केली नाही. तुम्हाला आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करायचे होते. तुम्ही माझा आणि माझ्या कवितेचा घोर अपमान केला आहे.” राजाला तेव्हां आपली चूक कळली व त्यांने कवींची क्षमा मागितली अन आपल्या दरबारी रुजू होण्याची विनंती केली. पण स्वाभिमानी कवी भूषण तडक त्या राजाच्या दरबारातून थेट शिवछत्रपतींच्या दरबारी परतले!   

भूषण यांच्या अद्वितीय कवितेमध्ये राष्ट्रीय चेतना ओसंडून वाहत असते. ते खऱ्या अर्थाने राष्ट्रीय भावनेने भारलेले कवी आहेत.महाकवी भूषण यांचे हिंदी साहित्यात अनोखे स्थान आहे. रत्नांचा खच पडलेला असतांनाही जसा कोहिनूर आपल्या लखलखणाऱ्या तेजाने उठून दिसतो, तद्वतच रीतिकालात शृंगार आणि हास्यरसाची प्रचुर साहित्य निर्मिती करणाऱ्या कवींच्या गराड्यात कविराज भूषण आपल्या आगळ्यावेगळ्या वीररसाने ओतप्रोत कवितेमुळे अजरामर झालेले आहेत. आपल्या जाज्वल्य लेखनातून त्यांनी तत्कालीन असहाय्य हिंदू समाजाला शौर्याचे धडे शिकवले आणि हिंदू संस्कृतीच्या ऐश्वर्याची नव्याने ओळख पटवून दिली. त्यांचे काव्य निःसंशयपणे राष्ट्राचा अमर वारसा आहे आणि तो जपून ठेवणे आपले परम कर्तव्य आहे. 

– समाप्त –

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रात्री वायफाय बंद का केला पाहिजे ? लेखक : श्री मिलिंद पंडित ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? इंद्रधनुष्य ?

☆ रात्री वायफाय बंद का केला पाहिजे ? लेखक : श्री मिलिंद पंडित ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन 

रात्री वायफाय बंद का केला पाहिजे ?

जवळपास सर्वांच्याच घरी आजकाल वायफाय हा असतोच. मग ते वर्क फ्रॉम होमसाठी असो किंवा मग सोशल नेटवर्किंग असो घरात वायफाय असणं आत फार महत्त्वाचं झालं आहे. त्यामुळे वायफाय राउटर हा आता जवळजवळ सगळ्याच घरात असतोच. राउटरमुळे लोक दिवस रात्र फास्ट स्पीड मध्ये इंटरनेटचा वापर होतो. एकदा का हा राउटर घरी घेतला आणि त्याचे महिन्याचे पैसे भरले की तुम्ही त्याला ५-६ डिव्हाइस आरामत जोडू शकता. काही वाय-फाय राउटरला तर त्याहून जास्त डिवाइस जोडले जाऊ शकतात. तुम्ही कसा प्लान घेताय त्यावर ते अवलंबून असतं.

मुख्य म्हणजे वायफाय वापराला जातो तो रात्री. कारण चित्रपटांपासून ते सीरिजपर्यंत सगळेजण टिव्हीवर किंवा मोबाईलवर पाहायला तोच निवांत वेळ असतो. त्यामुळे बहुतेक घरात रात्रंदिवस वायफाय राउटर सुरु असतो. त्यामुळे जवळपास सगळेच जण वायफाय सुरुच ठेवून झोपतात. पण हे अत्यंत चुकीचं असून, यामुळे नुकसान होऊ शकतं. त्यामुळे रात्री वायफाय राउटर बंद करणं गरजेचं आहे.

रात्री वायफाय बंद का केला पाहिजे?

१) जर घरातील वायफाय राउटर रात्रभर चालू राहिल्यास त्यातून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे काही वेळाने शरीरात अनेक आजार उद्भवू शकतात. हे राउटर मधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे होतं.

२) इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे, शरीरात रोग उद्भवू शकतात जे धोकादायक आहेत आणि त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो.

४) वाय-फाय रेडिएशनच्या सततच्या संपर्कामुळे पुरुषांच्या पुनरुत्पादक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. जे लोक वारंवार वायरलेस इंटरनेट वापरतात त्यांच्यात वायर्ड इंटरनेट वापरकर्त्यांच्या तुलनेत शुक्राणूंची गती कमी होतेय.

४) २०१५ च्या अभ्यासात वाय-फायच्या संपर्कात असलेल्या सशांमध्ये हृदयाच्या लय आणि रक्तदाबातील बदल आढळून आले आहेत. हृदय व रक्तवाहिन्यांवरही या रेडिएशनचा प्रभाव पडतो जो हानिकारक आहे.

५) रात्री वायफाय बंद केल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते.

६) रात्री वायफाय बंद केल्याने विजेची बचत होते.

७) रात्री वायफाय बंद केल्याने कनेक्शन सुरक्षित राहते आणि हॅकिंगचा धोका कमी होतो.

अशा पद्धतीने रात्रभर वायफाय सुरु ठेवून तुम्ही त्याच्या संपर्कात झोपत असाल तर नक्कीच गंभीर समस्यांना सामोर जाव लागू शकतं. त्यामुळे जर तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे शरीरात होणाऱ्या रोगांपासून स्वतःचे संरक्षण करायचं असेल, तर वायफाय राउटर वापरल्यानंतर तो बंद करण्याचा प्रयत्न करा. किंवा झोपताना तरी वायफाय बंद करण्याचा प्रयत्न करा.

माहिती संकलन : श्री मिलिंद पंडित, कल्याण. 

प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘कविराज भूषण…’  (पूर्वार्ध) – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘कविराज भूषण…’  – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

(पूर्वार्ध)

महाकवी भूषण (१६१३ – १७१५) हे ‘रीतिकाल’ मधील प्रमुख हिंदी कवी गणले जातात. जेव्हा इतर कवी शृंगाररसपूर्ण काव्य रचत होते, तेव्हा भूषण यांनी वीररसाने ओतप्रोत रचना करून स्वतःला सर्वांपेक्षा वेगळे सिद्ध केले. कवी भूषण मोरंग, कुमाऊं, श्रीनगर, जयपूर, जोधपूर, रेवा, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रसाल इत्यादींच्या आश्रयाखाली राहिले, परंतु त्याचे आवडते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजा छत्रसाल हेच होते.

महाकवी भूषण मूळचे टिकवापूर या गावाचे रहिवासी होते असे मानल्या जाते. हे गाव आजच्या उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातल्या घाटमपूर तालुक्यात स्थित आहे. त्यांचे दोन भाऊ व्यापमणी आणि मतिराम हे देखील कवी होते. त्यांचे मूळ नाव ज्ञात नाही, मात्र ‘शिवराज भूषण’ या ग्रंथाच्या खाली दिलेल्या दोह्याचा संदर्भ जोडला तर, चित्रकूटचे राजे हृदय राम यांचा मुलगा रुद्र शाह याने त्यांना मानाने ‘भूषण’ ही उपाधी दिलेली होती. त्यांच्या उत्तुंग साहित्याला शोभेल अशीच ही पदवी आहे असे वाटते.  

कुल सुलंकि चित्रकूट-पति साहस सील-समुद्र।

कवि भूषण पदवी दई, हृदय राम सुत रुद्र॥ 

भूषण हे आपल्या भावांसोबत राहत असत. एकदा त्यांनी जेवतांना आपल्या भावजयीला मीठ मागितले. भावजयीने हे मीठ विकत घेण्यापुरते पैसे कमावून आणा, अशी त्यांची निर्भत्सना केली. ती जिव्हारी लागल्याने हा स्वाभिमानी कवी घर सोडून निघून गेला. (पुढे राजकवी झाल्यावर त्यांनी आपल्या भावजयीला १ लाख रुपयांचे मीठ पाठवून दिले असे म्हटल्या जाते.) कित्येक राजांच्या दरबारी राहिल्यानंतर ते पन्नानरेश राजा छत्रसाल यांच्याकडे राजकवी म्हणून रुजू झाले, तेथून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्रयास गेले. कांही वर्षानंतर छत्रसाल महाराजांकडे ते परत गेले. परंतु त्यांचे मन तिथे लागेना अन ते शिवरायांच्या दरबारात परतले ते कायम त्यांच्याच सेवेशी एकनिष्ठ राहण्यासाठी! खरे तर इतक्या राजांच्या दरबारी चाकरी करूनही ते खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रसाल या दोनच राजांचे खरे प्रशंसक होते. त्यांनी स्वतःच आपल्या काव्यात याची कबुली दिली आहे, ती अशी-

और राव राजा एक मन में न ल्याऊं अब।

साहू को सराहों कै सराहौं छत्रसाल को॥

इसवी १७१५ मध्ये कवी भूषण मृत्यू पावले.  

कवी भूषण यांची साहित्य संपदा: 

विद्वान मंडळी मानतात की शिवराजभूषण, शिवाबावनी, छत्रसालदशक, भूषण उल्लास, भूषण हजारा आणि दूषनोल्लासा असे सहा ग्रंथांचे लेखन कवी भूषण यांनी केले आहे. परंतु यांच्यापैकी फक्त शिवराज भूषण, छत्रसाल दशक आणि शिवाबावनी हेच काव्य ग्रंथ आज उपलब्ध आहेत. कविराज यांनी शिवराजभूषणमध्ये प्रचुर अलंकारिक काव्य, छत्रसाल दशकमध्ये छत्रसाल बुंदेलाचे पराक्रम, दानशीलता आणि शिवाबावनी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणवर्णन केले आहेत.

‘शिवराज भूषण’ हा एक विशाल काव्यग्रंथ असून त्यात ३८५ पद्य (काव्ये) आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय शौर्याचे आणि पराक्रमाचे ओजस्वी वर्णन करणाऱ्या शिवाबावनीमध्ये ५२ कविता आहेत. बुंदेला शूर छत्रसालच्या शौर्याचे वर्णन ‘छत्रसाल दशक’ मधील दहा कवितांमध्ये केले आहे. त्यांचे संपूर्ण काव्य वीररसाने, चैतन्य तेजोमय गुणांनी आणि जोमाने भारलेले आणि रसरसलेले आहे. या काव्यांत महानायक आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि खलनायक आहे मुघल बादशहा औरंगजेब. औरंगजेबाप्रती त्यांचा हा तीव्र विरोध जातीच्या वैमनस्यावर आधारित नाही तर एका जुलमी आणि नृशंस शासकाच्या दुष्कृत्यांविरुद्ध आहे.

रीतिकाव्याची सर्वात महान उपलब्धी होती हिंदीच्या एका सुसंस्कृत आणि सहृदय समाजाची निर्मिती. या काळात सांस्कृतिक आणि कलात्मक वैभवाने चरम सीमा गाठली होती. कलात्मक काव्य या काळात प्रचुर मात्रेत रचल्या गेले.वाकपटू कवींच्या माध्यमातून मुळातच गोड अशी ब्रज भाषा आणखीच रमणीय झाली. लवचिक, भावपूर्ण आणि लालित्यपूर्ण शब्दार्थांच्या अभिव्यक्तीमुळे ही राजस भाषा त्या काळातल्या कवी मंडळींची लाडकी ‘काव्य भाषा’ बनली. त्या काळात शृंगार रसाने परिष्कृत काव्य हे सर्वाधिक परिचित आणि रसिकमान्य होते.

भूषण यांच्या काव्यातील वैशिष्ट्ये:

मात्र या शृंगारिक वातावरणात भूषण यांचे मन रमेना. मुघलांचे हिंदूंवर होत असलेले निर्घृण अत्याचार ते सतत बघत होते. आपला समाज लाचार, बलहीन आणि चैतन्यशून्य झाला होता. म्हणूनच देशभक्तीची ज्योत जगवणे हेच आपले इतिकर्तव्य समजून कवी भूषण यांनी रीतिकालाच्या मळलेल्या वाटेवर चालण्याचे नाकारले. प्रवाहाविरुद्ध पोहत त्यांनी वीररसाने परिपूर्ण अशा काव्य रचना केल्या आणि अखिल आयुष्याचे तेच उद्दिष्ट ठेवले. त्यांच्या प्रत्येक कवितेची मूळ भावना शौर्याचे गुणगान करते. हिंदुत्वाचा सार्थ अभिमान आणि त्यांच्या नायकांच्या अद्वितीय शौर्याचे वर्णन हेच त्यांच्या कवितेचं गमक आहे. भूषण यांची काव्य शैली त्यांच्या विषयास अत्यंत अनुकूल आहे, तसेच ओजपूर्ण आणि वीररसपूर्ण आख्यान मांडायला सर्वथा उपयुक्त आहे. प्रभावोत्पादक, प्रसंगात्मक चित्रमयता आणि सरस शब्दालंकार योजना भूषण यांच्या काव्यशैलीची मुख्य वैशिष्ठे आहेत. या महान देशभक्त कवीने मुघलांच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला आणि निराश झालेल्या हिंदू समाजात आशा निर्माण करून त्यांना संघर्ष करण्यास प्रोत्साहित केले. हा विषय मांडतांना त्यांनी छत्रपती शिवाजी आणि राजा छत्रसाल हे काव्य नायक निवडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याबद्दल लिहितांना भूषण यांच्या लेखणीला हजारो धुमारे फुटलेले बघायला मिळतात. ‘शिवभूषण’ या काव्यग्रंथातील एक काव्य स्फुल्लिंग बघा. 

सबन के ऊपर ही ठाढ़ो रहिबे के जोग, ताहि खरो कियो जाय जारन के नियरे,

जानि गैर मिसिल गुसीले गुसा धारि उर, कीन्हों न सलाम, न बचन बोलर सियरे।

भूषण भनत महाबीर बलकन लाग्यौ, सारी पात साही के उड़ाय गए जियरे,

तमक तें लाल मुख सिवा को निरखि भयो, स्याम मुख नौरंग, सिपाह मुख पियरे॥’

औरंगजेबाच्या दरबारात शिवरायांना जेव्हां सहा हजारी मनसबदारांच्या ओळीत स्थान देण्यात आले, तेव्हां या अपमानाने ते पेटून उठले. भर दरबारात ते क्रोधावेशाने औरंगजेबास दरबारात तक्रार करू लागले, त्या दृश्याचे चित्रण या रौद्ररसाने भरलेल्या काव्यांशात केले गेले आहे. 

अर्थ: मुघल दरबारात सर्वोच्च स्थानी उभे राहण्यास सक्षम असलेल्या सर्जा शिवाजीचा अपमान करण्याच्या उद्देशानेच त्यांना ते आसन दिलेले होते. औरंगजेबाच्या या अपमानजनक वागणुकीमुळे शिवाजी संतप्त झाले, त्या वेळी त्यांनी औरंगजेबाला सलाम केला नाही आणि दरबाराच्या शिष्ठतेनुसार विनम्र शब्द देखील उच्चारले नाहीत. महाबली शिवाजी रागाने गर्जना करू लागले आणि त्याचे हे क्रोधायमान वर्तन पाहून मुघल दरबारातील सर्वांच्या मनात चलबिचल होऊन ते घाबरून किंकर्तव्यमूढ झाले. रागाने लाल झालेला शिवरायांचा चेहरा पाहून औरंगजेबाचा चेहरा काळवंडला आणि सैनिकांची तोंडे कमालीच्या भीतीग्रस्ततेने पिवळी पडली.

धर्मरक्षक शिवाजी महाराजांचे कवी भूषण यांनी केलेले काव्य वर्णन:

हिंदू धर्माच्या अतिरेकी द्वेषाने पछाडलेला मुघल बादशहा औरंगजेब जेव्हां हिंदू समाजावर, त्यांच्या धर्मावर आणि संस्कृतीवर घाला घालत होता, तसेच मुस्लिम धर्माची पाळेमुळे हिंदुस्तानात रुजवण्याचा प्रयत्न करीत होता, तेव्हां गो ब्राम्हण प्रतिपालक, हिंदू धर्माचे रक्षणकर्ते म्हणून छत्रपती शिवराय अखंड प्रयत्नशील होते.  त्याच संदर्भातील हे वर्णन बघा!

देवल गिरावते फिरावते निसान अली ऐसे डूबे राव राने सबी गये लबकी,

गौरागनपति आप औरन को देत ताप आप के मकान सब मारि गये दबकी।

पीरा पयगम्बरा दिगम्बरा दिखाई देत सिद्ध की सिधाई गई रही बात रबकी,

कासिहू ते कला जाती मथुरा मसीद होती सिवाजी न होतो तौ सुनति होत सबकी॥

अर्थ: संपूर्ण हिंदुस्थानात हिरवी फडकी ज्यावर चंद तारे कोरले आहेत अशी फडकी फडकताना दिसत होती. मोठमोठाले राजे मात्तब्बर राजे मुसलमानांचे मांडलिक झाले होते. साधू संतांची सिद्धी फळाला येत नव्हती तसेच तपश्चर्या कामाला येत नव्हती. अशावेळी कविराज भूषण गणरायाला लटक्या रागाने विचारतात: अहो गणराय आणि श्री गौरी तुम्ही खरे असुर संहारक परंतु तुम्ही देखील तुमच्या देवळात दडी मारून बसलात. अहो छत्रपती शिवरायांनी हे हिंदवी स्वराज्याचे काम हाती घेतले नसते तर काशीची कला लयाला गेली असती, मथुरेत मशीद वसली असती आणि आम्हा सर्व हिंदूंना सुंता करून घ्यावी लागली असती!

भारतीय संस्कृतीचे जाणकार कविराज भूषण:  

हिंदूंना त्यांची हरवलेल्या शक्तीची जाणीव करून देण्यासाठी कविराजांनी संस्कृतीचा उचित वापर केला. त्यांनी अनेक देवी-देवतांच्या कार्यांचा उल्लेख केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यांची गणना त्या महान देवी देवतांच्या कार्यांच्या श्रेणीत केली. शिवाजी महाराजांना धर्म आणि संस्कृतीचे प्रणेते म्हणून त्यांनी आपल्या काव्यात चित्रित केले. खालील ओळी त्याच्याच परिचयक आहेत.  

बेद राखे बिदित पुरान परसिद्ध राखे राम-नाम राख्यो अति रसना सुघर में। 

हिंदुन की चोटी रोटी राखि है सिपाहिन की काँधे में जनेऊ राख्यो माला राखी गर में। 

मीड़ि राखे मुग़ल मरोड़ि राखे पातसाह बैरी पीसि राखे बरदान राख्यो कर में। 

राजन की हद्द राखी तेग-बल सिवराज देव राखे देवल स्वधर्म राख्यो घर में॥ 

अर्थ: भूषण म्हणतात की महाराज शिवाजींनी आपल्या अफाट सामर्थ्याच्या जोरावर हिंदू धर्माचे रक्षण केले. औरंगजेबाला परास्त करून त्याने वेदांसारख्या हिंदू धर्मग्रंथांना नष्ट होण्यापासून वाचवले आणि दुसरीकडे वेदांमध्ये असलेल्या ज्ञानाचा प्रसार केला. याशिवाय त्यांनी हिंदू धर्माचे सार असलेल्या पुराणांचे रक्षण केले आणि रामनामाचे महत्त्वही अबाधित ठेवले. त्यावेळी हिंदूंची धार्मिक प्रतीके मुस्लिमांकडून नष्ट केली जात होती. त्यांनी हिंदूंना डोक्यावरील केसांच्या शेंड्या (शिखासूत्र) कापण्यापासून वाचवले आणि त्यांना उदरनिर्वाह देऊ केला. त्यांनी हिंदूंना त्यांच्या गळ्यात पवित्र जानवे (यज्ञोपवीत) आणि तुळशीमाळ घालण्याचे संरक्षण दिले. त्यांनी दिल्लीच्या पातशहाचे कंबरडे मोडले आणि त्याच्या सर्व शत्रूंचा नाश केला. राजांच्या हातात देवतुल्य वरदहस्ताची शक्ती होती, अर्थात जो कोणी त्यांच्या आश्रयास गेला, त्याला त्यांनी आपल्या पंखांखाली घेतले. या महान राजाने हिंदू राजांच्या राज्याच्या सीमांचे रक्षण केले आणि आपल्या तळपत्या तलवारीच्या बळावर देवस्थानांचे रक्षण केले. इतकेच नव्हे तर शूरवीर शिवाजी राजाने प्रत्येक घराघरात स्वधर्म (हिंदू धर्म) अबाधित राखला. 

उत्तरार्धात कविराज भूषण यांच्या अशाच काही राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत अशा काव्य रचना बघू या.  

– क्रमशः भाग पहिला (पूर्वार्ध)

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares