मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पत्त्यांची गंमत ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ? 

☆ पत्त्यांची गंमत  ☆ श्री सुहास सोहोनी ☆ 

पत्ते हे सामान्यतः आयताकृती पातळ पुठ्ठ्याचे  किंवा प्लास्टिकचे बनविलेले असतात. बदाम, इस्पिक, किल्वर आणि चौकट,  या चार प्रकारात प्रत्येकी १३ पत्ते मिळून ५२ पत्त्यांचा संच होतो.

पत्त्यांची विभागणी एक्का, दुर्री, तिर्री, या क्रमाने दश्शी पर्यन्त, मग गुलाम, राणी, राजा, आणि  याशिवाय 2 जोकर असतात.

१) ५२ पत्ते म्हणजे ५२ आठवडे

2) ४ प्रकारचे पत्ते म्हणजे ४ ऋतु.  प्रत्येक ऋतूचे १३ आठवडे.

3) या सर्व पत्त्याची बेरीज ३६४ 

४) एक जोकर धरला तर ३६५ म्हणजे १ वर्ष.

५) 2 जोकर धरले तर ३६६ म्हणजे लीप वर्ष.

६) ५२ पत्यातील १२ चित्रपत्ते म्हणजे १२ महिने

७) लाल आणि काळा रंग म्हणजे दिवस आणि रात्र.

पत्त्यांचा अर्थ समजून घेऊ

१) दुर्री म्हणजे पृथ्वी आणि आकाश

2) तिर्री म्हणजे ब्रम्हा, विष्णू आणि महेश

3) चौकी म्हणजे चार वेद ( ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद,आणि अथर्ववेद, )

४) पंजी म्हणजे  पंच प्राण (प्राण, अपान, व्यान, उदान ,समान)

५) छक्की म्हणजे षड्रिपु (काम ,क्रोध,मद,मोह, मत्सर,लोभ)

६) सत्ती- सात सागर

७) अठ्ठी – आठ सिद्धी

८) नववी- नऊ ग्रह

९) दश्शी – दहा इंद्रिये

१०) गुलाम- मनातील वासना

११) राणी- माया

१२) राजा-सर्वांचा शासक

१३) एक्का- मनुष्याचा विवेक

१४) समोरचा भिडू – प्रारब्ध

पत्त्याचा डाव खेळताना आयुष्याच्या डावाचा अर्थ समजून घेतला तर जगणे नक्कीच सोपे होऊ शकते!!!

 

 संग्राहक : — सुहास सोहोनी

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अर्धा ग्लास ☆ संग्राहक – श्री माधव केळकर

?इंद्रधनुष्य? 

☆ अर्धा ग्लास ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆ 

हॉटेलमध्ये वेटरकडून किंवा इतर ठिकाणी कुणाकडूनही पिण्यासाठी पाणी घेताना कृपया फक्त दोन शब्द म्हणा..‘ अर्धा ग्लास ‘–  कारण आपले दोन शब्द कुणाचे तरी प्राण वाचवू शकतात .

खरं वाटत नाही आहे ना– मग हा संदेश नक्की पूर्ण वाचा .

आज काही मित्रांना भेटायला एका हॉटेल मधे गेलेलो. विषय अर्थातच पाण्याचा होता. गप्पा चालू होत्या.  विषय जसा-जसा पुढे सरकत होता, तसं एक गोष्ट पहात होतो– अनेक टेबल्सवर लोक बिल पे करून निघून जाताना पिऊन उरलेले पाण्याचे अर्धे ग्लास तसेच राहत होते… गोष्ट अतिशय नॉर्मल अन कित्येकदा स्वतः केलेलीही अन पाहिलेलीही…

आमच्याही टेबलवर जाताना मला 4 ग्लास अर्धेच दिसले. आमच्याच नकळत घडलेलं हे—

मनाला काहीतरी खटकत होतं.

मीटिंग संपली. सगळे बाहेर आलो. मित्रांना Bye करून परत हॉटेलमध्ये गेलो. परवानगी घेतली अन वेटर्सचा जो मॅनेजर होता त्याला भेटलो. 

म्हटलं, “ हे आता जे आमच्या टेबलवरचं चार अर्धे  ग्लास पाणी होतं, त्याचं काय केलं ? “ 

तो म्हटला, “  ज्या वेटरने टेबल क्लिअर केलं असेल, त्याने ते पाणी बेसिनमधे ओतून दिलं असणार,  तेच करतो आम्ही. त्या उष्ट्या पाण्याचा काही उपयोग नाही ना आता.! “ 

“  विक-डेज मधे तासाला अंदाजे किती लोक येत असतील? ‘ मी विचारलं

“ नाही म्हटलं तरी १५  ते 20 जण सरासरी– दुपारी लंचला अन रात्री डिनरला जास्त.” त्याने सांगितलं . 

मग मी त्याला म्हटलं, “  म्हणजे १0 तास हॉटेल चालू आहे असं पकडलं, तर साधारण सरासरी २५० जण एका दिवसात हॉटेलला येतात. हेच शनिवार रविवार दुप्पट होणार. त्यातून तुमचं हे छोटं हॉटेल. मोठ्या हॉटेल्सची हीच संख्या हजारात असणार ! म्हणजे सरासरी रोज ३५० जण. यातल्या साधारण 200 जणांनी जरी अर्धा किंवा एक ग्लास पाणी न पिता तसंच ठेवलं, तर अंदाजे १00 लिटर पाणी बेसिनमधे “रोज वाया”. म्हणजे एक हॉटेल कमीतकमी १00 लिटर “अतिशय चांगलं अन प्रोसेस्ड पाणी” बेसिन मधे रोज ओतून देतं. हे पाणी ड्रेनेजमधून जाऊन शेवटी नदीच्या इतर ‘घाण’ पाण्यात मिसळतं. “ 

पुण्यात सध्या अंदाजे छोटे मोठे पकडून ६000 च्या वर हॉटेल्स आहेत– म्हणजे दिवसाला 6000*100 लिटर– म्हणजे 6 लाख लिटर  प्यायचं पाणी आपण रोज नुसतं ओतून देतोय. आता या घडीला हे झालं एका दिवसाचं.  असं आठवड्याचं म्हटलं तर ४2 लाख लिटर, अन वर्षांचं म्हटलं तर 22 कोटी लिटर शुद्ध पिण्याचं पाणी आपण फक्त ओतून देतोय.

या पाण्याला शुद्ध करायचा आलेला खर्च वेगळाच.

हे झालं एका शहराचं– अशी महाराष्ट्रात कमीत कमी १५ मोठी शहरं आहेत .

बरं हे कोणत्या देशात घडतंय??—तर जिथं सरकारी आकडेवारीनुसार दर ४ तासाला एक जण ‘शुद्ध पाण्याअभावी’ होणाऱ्या डायरियासारख्या रोगाने मरतोय, त्या देशात.

म्हणजे एकीकडे लोक पाण्यावाचून तडपून मरतायत.  अन दुसरीकडे  एवढं शुद्ध केलेलं पाणी आपणच मातीत मिसळतोय.

आपण जे वाया घालवतोय, ते शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी आहे— ” उद्या शेतकऱ्याच्या गळ्यात पडणारे फास आपण आपल्या हातानेच एका बाजूला आवळत असताना, दुसऱ्या बाजूला आपणच त्यांना वाचवायच्याही बाता करतोय “…

हे सगळं थांबू शकतं, फक्त तुमच्या ओठातून येणाऱ्या “दोन” शब्दांनी….. 

इथून पुढं कधीही वेटर वा इतर कोणीही तुमच्यासमोर  ग्लासमधे पाणी ओतत असेल, तर त्याला फक्त एवढंच म्हणा —–’ अर्धा ग्लास !! ‘

ह्याने तुम्हाला लागेल एवढंच पाणी तुम्ही घ्याल अन उरलेलं पाणी वाचेल.  हॉटेलचं वाचलं म्हणजे नगरपालिकेचं, नगरपालिकेचं वाचलं म्हणजे धरणांचं अन धरणांचं वाचलं म्हणजे “आपलंच..!!”

हे वाचलेले पाणी शेतकऱ्याला वा पाण्याअभावी मृत्यु पावणाऱ्या लोकांना  मिळेल.

याची सुरुवात आपण फक्त दोन शब्द बोलायची सवय लावून करायची आहे.

फार छोटी गोष्ट,  पण तुमचे दोन शब्द तुमचेच 22 कोटी लिटर पाणी वाचवू शकतात. कृपया आपण जे निर्माण करत नाही, ते कमीतकमी वाचवूयात तरी … आपल्याच माणसांचे प्राण वाचवण्यासाठी…!!

 ( हाच उपाय आपण घरीपण करूया ) 

 

संग्राहक – सुश्री मानवी केळकर/श्री माधव केळकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीज्ञानेश्वरी ‘जयंती’चा रोचक इतिहास ☆ संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने

? इंद्रधनुष्य ? 

☆ श्रीज्ञानेश्वरी ‘जयंती’चा रोचक इतिहास ☆ संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने ☆ 

भाद्रपद वद्य षष्ठी ही तिथी श्री ज्ञानेश्वरी जयंती म्हणून साजरी करण्यात येते. अर्थात श्री ज्ञानेश्वरमहाराजांनी हा ग्रंथ या दिवशी लिहून पूर्ण केला असा काहींचा समज झाला असेल.  परंतू  ते खरे नाही. पैठणनिवासी शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराजांनी इ.स.१५८४ साली याच तिथीस या ग्रंथाची शुद्धप्रत तयार करुन पूर्ण केली. 

झाले असे की, समाधीस्थानात गळ्याभोवती विळखा घातलेली अजानवृक्षाची मुळी काढण्याच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वरमहाराजांनी संत एकनाथमहाराजांना स्वप्नात दृष्टांत दिला आणि आळंदीला बोलावून घेतले. नाथमहाराज आळंदीला आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की , माऊलींची समाधी सापडत नाहीये. परिसरात चौकशी केली तर असे कोणते स्थान येथे असल्याचे खात्रीलायक कोणाला माहित नसल्याचे कळले. यदाकदाचित समाधी असली तरी ते स्थान नेमके कोणते हे सांगता येत नाही असे कळले.

आपल्याबरोबर आलेल्या भक्तमंडळीना इंद्रायणी नदीच्या तीरावर थांबायला सांगून नाथमहाराज तेथील जंगलसदृश्य परिसरात गेले. माऊलींच्या समाधीचा परिसर काट्याकुट्यांनी व्यापला होता. त्यातच परिसरात असलेल्या अनेकानेक समाध्या ! मग यातील नेमकी माऊलींची समाधी कोणती? हा प्रश्न पडला. मग एका स्थानावर बसून नाथ महाराजांनी माऊलींचे ध्यान लावले. (हे स्थान म्हणजे हल्ली माउलींच्या समाधी मंदिरात असलेला ‘शांतिब्रह्म श्री संत एकनाथमहाराज पार’ होय.) ज्ञानेश्वरमहाराजांनी समाधीच्या आत येण्याचा निर्देश केला.  त्याप्रमाणे नाथमहाराज नंदीखालील द्वारातून आत गेले. तेथे श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे ते दिव्य अलौकिक स्वरूप पाहून नाथ हरखून गेले.

श्री ज्ञानदेवे येऊनि स्वप्नात !

सांगितली मात मजलागी !!

दिव्य तेज:पुंज मदनाचा पुतळा !

परब्रह्म केवळ बोलतसे !!

अशी त्यांची भावना झाली. चर्चा सुरु असताना श्रीज्ञानेश्वरीमध्ये समाविष्ट झालेल्या, हेतुपुरस्सर टाकल्या गेलेल्या आगंतुक ओव्यांनी माऊली व्यथित झालेे असल्याचे नाथमहाराजांनी जाणले. त्यांना त्यात योग्य ती सुधारणा करण्यासाठी अधिकारसंपन्न व्यक्तीची आवश्यकता होती व ती नाथ महाराजांच्या रुपाने पूर्ण होणार होती. त्यामुळे अजानवृक्षाच्या मुळीचे निमित्त करुन माऊलींनी नाथमहाराजांना बोलावून घेतले होते. या दोन महात्म्यांचा श्रीज्ञानेश्वरीसंदर्भाने समाधीत तब्बल तीन दिवस संवाद चालला. 

तीन दिवस झाले तरी नाथमहाराज परत न आल्याने बरोबर आलेल्या भाविकांच्या मनात घालमेल होऊ लागली. भक्तांचे हाल होऊ नयेत यासाठी श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी वाण्याचे रुप घेतले व नाथ महाराजांनी तुमची शिधापाण्याची व्यवस्था लावण्याचे सांगितले असल्याचे त्यांना सांगितले. 

समाधीस्थानातून बाहेर आल्यावर सर्व भाविकांना माऊलींच्या समाधीचे दर्शन घडावे या हेतूने नाथ सर्वांना त्या स्थानी घेउन आले व सर्वांना माऊलींचे दर्शन घडविले. समाधीचा शोध लावल्यानंतर समाधीचा जीर्णोद्धार केला, मूळ गाभारा बांधला, मंदिर परिसर सुशोभित केला, नित्य पुजेची व्यवस्था लावली व आळंदीची कार्तिकीयात्रा पुन्हा सुरु केली. 

या नंतर वर्षभरातच श्री संत एकनाथमहाराजांनी श्रीक्षेत्र पैठण येथे श्रीज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली. त्याची पूर्णता ज्या दिवशी झाली तो दिवस म्हणजे भाद्रपद वद्य षष्ठी ! आणि तोच दिवस 

“ श्रीज्ञानेश्वरी जयंती  ‘ म्हणून वारकरी संप्रदायात साजरा करण्यात येतो.

श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी इ स १२९० मध्ये ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली.  परंतू  समाप्तीची तिथी न लिहिल्याने श्रीज्ञानेश्वरी जयंतीचा नेमका दिवस कोणता ? हे सांगता येत नाही. 

पुढील काही काळात नाथमहाराजांनी महाराष्ट्र आणि बाहेरीलही श्रीज्ञानेश्वरीच्या शेकडो प्रती जमा करुन शुद्ध प्रती  तयार केल्या व शुद्धप्रती परत  पोचत्या केल्या. 

आज ज्या श्रीज्ञानेश्वरीचे आपण पारायण करतो, ती श्री नाथमहाराजांनी शुद्ध केलेली आहे. म्हणून नाथमहाराज हे श्रीज्ञानेश्वरीचे आद्य संपादक आहेत. एवढेच नाही,  तर ते मराठी वाङ्मयाचेही आद्य संपादक ठरतात. श्रीएकनाथमहाराजांनी ग्रंथाच्या शेवटी चार ओव्या लिहून ठेवल्या आहेत,

 त्या अशा –

शके पंधराशे साहोत्तरी ! तारणनाम संवत्सरी !

एकाजनार्दने अत्यादरी ! गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली !!१!!

 

ग्रंथ पुर्वीच अतिशुद्ध ! परि पाठांतरी शुद्ध अबद्ध !

तो शोधुनिया एवंविध ! प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी !!२!!

 

नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका ! जयाची गीतेची वाचितां टीका ! 

ज्ञान होय लोकां ! अतिभाविकां ग्रंथार्थिया !!३!!

 

 बहुकाळ पर्वणी गोमटी ! भाद्रपद मास कपिलाषष्ठी !

 प्रतिष्ठानी गोदातटी ! लेखन कामासाठी संपूर्ण जाहली !!४!!

हा आहे श्रीज्ञानेश्वरी ‘जयंती’चा इतिहास ! 

(संकलन- श्री सद्गुरू ह.भ.प श्री योगीराज महाराज गोसावी ( पैठणकर )- शांतिब्रह्म श्रीमंत  श्रीसंत एकनाथ महाराज यांचे 14 वे वंशज.).

जय ज्ञानेश्वर…. जय एकनाथ—–

संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ फिरूनी पुन्हा जन्मेन मी.. ☆ संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ फिरुनी पुन्हा जन्मेन मी ! ☆ संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर ☆ 

मध्यप्रदेशाची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये एप्रिल आणि मे मध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला होता. गेल्या चार महिन्यात भोपाळच्या भदभदा विश्रामघाटावर सात हजाराहून अधिक मृतदेहांवर अंतिम संस्कार झाले. दररोज होणारे शेकडो लोकांचे मृत्यु आणि रात्रंदिवस जळणाऱ्या चिता यामुळे हा विश्रामघाट चर्चेत आला होता. भोपाळच्या याच बहुचर्चित भदभदा विश्रामघाटावर सध्या एक अनोखा उपक्रम राबवला जात आहे. हा प्रेरणादायी प्रयोग भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात पहिल्यांदाच घडतो आहे, ही एक अभिमानाची गोष्ट आहे.

स्मशानभूमीशेजारी असलेल्या मोकळ्या जागेमध्ये कोरोनामध्ये जीव गमावलेल्या आप्तस्वकीयांच्या स्मरणार्थ एक आगळेवेगळे कोविड स्मृतीवन निर्माण केले जात आहे. बारा हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर असलेल्या जमिनीवर जपानचे मियावाकी तंत्रज्ञान वापरुन हे नवे घनदाट उद्यान फुलवण्यात येत आहे. विशेष म्हणजे कोरोना महामारीमुळे ज्यांचे अंतिम संस्कार या स्मशानभुमीमध्ये झाले, त्या सर्व मृतदेहांची राख या उद्यानातील झाडांसाठी खत म्हणून वापरली जात आहे. या बागेमध्ये पन्नासहून अधिक प्रजातींच्या तब्बल साडेचार हजार वृक्षांची रोपं लावली जाणार आहेत. नुकतीच या उपक्रमाची सुरुवात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि त्यांच्या पत्नी साधना सिंग यांच्या शुभहस्ते करण्यात आली. 

उद्यानासाठी लागणारी माती विश्रामघाटातील राख, सुपीक काळी माती, शेणखत यांच्या मिश्रणापासून तयार केली गेली. कोरोनाने हिरावून घेतलेल्या आपल्या आप्तस्वकीयांच्या आठवणी वृक्षारोपणाच्या माध्यमातून कायमच्या जतन करण्यासाठी सात जुलैच्या संध्याकाळपर्यंत हे उद्यान सामान्य जनतेसाठी खुले ठेवण्यात आले होते. या आवाहनाला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला. आपल्या प्रिय स्वजनांना गमावल्यामुळे व्याकूळ झालेल्या लोकांनी या उद्यानाच्या निर्मितीमध्ये मोठा हातभार लावला. आपली प्रिय व्यक्ती, तिच्या आठवणी एका वृक्षाच्या रुपात कायमच्या जतन केल्या जातील या भावनेने त्यांच्या मानसिक आघातावर फुंकर घालण्याचे काम केले. 

भदभदा विश्रामघाटाचे सचिव ममतेश शर्मा यांनी सांगितले की एप्रिल-मेमध्ये आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या भीषण लाटेमध्ये अनेक लोक केवळ अस्थी घेऊन जात होते. मात्र संसर्गाच्या भीतीने मृतदेहाची राख सावडण्यास कोणीही तयार नव्हते. पंचवीस डंपर एवढे भस्म या विश्रामघाटावर साठले होते. या राखेच्या डोंगरांचे काय करावे असा प्रश्न  उपस्थित झालेला असताना या राखेचा वापर करुन जपानी पद्धतीच्या मियावाकी पद्धतीने दाट वनराईची निर्मिती केली जाऊ शकते अशी एक कल्पना पुढे आली आणि त्यातून या श्रीरामवनाचा जन्म झाला. 

मियावाकी पद्धतीने लागवड केलेली रोपं दुप्पट वेगाने वाढतात. त्यांचा टवटवीतपणा तीव्र उन्हातही टिकून राहतो. या पद्धतीने लागवड केलेल्या वनांचे तापमान आजूबाजूच्या परिसरापेक्षा तीन ते चार अंशांनी कमी असते. येत्या पंधरा ते अठरा महिन्यांमध्ये या इवल्या इवल्या रोपांचे मोठ्या वृक्षांमध्ये रुपांतर होवून लवकरच या ओसाड जागेचा कायापालट होईल. स्मशानभूमीत नंदनवन फुलवणे हे एक मोठे आव्हान होते. कोरोना महामारीच्या आणि भुताखेतांच्या भीतीमुळे चिताभस्मापासून खत तयार करण्याच्या कामास कोणीही तयार नव्हते. शेवटी भोपाळमधील मास्टर ऑफ सोशल वर्क या पदव्युत्तर महाविद्यालयाच्या तरुणांनी हिरीरीने पुढाकार घेतला आणि या उद्यानाची पायाभरणी झाली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आपल्या सर्वांना ऑक्सिजनचे महत्व समजले. रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने आपल्या प्रियजनांना वाचवण्यासाठी ऑक्सिजन बेडच्या शोधात वणवण भटकणारे हवालदिल आणि चिंताग्रस्त लोक पाहून ऑक्सिजनला प्राणवायू का म्हणतात त्याची जाणीव प्रत्येक भारतीयाला झाली. भदभदा विश्रामघाटात जी घनदाट वनराई आकार घेत आहे, त्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती होईल. ही झाडे मोठी होवून येणाऱ्या काळात लोकांना या वनामध्ये छान हवा उपलब्ध होईल. मोकळा श्वास घेता येईल. या रोपांचे वृक्षांमध्ये रुपांतर होईपर्यंत त्यांची निगा राखण्याची जबाबदारी घाट प्रबंधन समितीकडे सोपवण्यात आली आहे. भारताच्या प्रत्येक स्मशानभूमीमध्ये अशा प्रकारची हिरवीगार दाट वनराई उभी केली तर मृताम्यांना खरी श्रद्धांजली मिळेल आणि पर्यावरणाचा, दूषित हवेचा गंभीर प्रश्न सुटण्यास नक्कीच मदत होईल.

संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पेशवाई भोजन कसे होतं — ☆ संग्राहक – कालिंदी नवाथे

? इंद्रधनुष्य ?

☆ पेशवाई भोजन कसे होतं —  ☆ संग्राहक – कालिंदी नवाथे ☆ 

आपण कोठेही चांगले जेवण मिळाले की त्याचे वर्णन “पेशवाई थाट” असा सहज करतो. पण प्रत्यक्षात “पेशवाई थाट” एवढा सोपा नव्हता! 

कसा होता “पेशवाई थाट”?

पेशवाईतील भोजनव्यवस्थेचा थाटमाट… 

पेशवे घराण्यातील खाशांच्या स्वयंपाकासाठी जळण म्हणून लाकडाऐवजी फक्त कोळसे वापरले जात. लाकडावर शिजवलेले अन्न पेशवे कधीही ग्रहण करीत नसत. नित्य, नैमित्तिक पंगतीचे भोजन बनविण्यासाठी पेशवाईत मक्ते दिले जात. 

पुण्यातील हिराबागेत निरनिराळ्या कारणास्तव पेशवे अनेक मेजवान्या आयोजित करत. त्या मेजवानीच्या बेतात साधा व केशरी गोड भात, कागदासारख्या पातळ पाटवड्या, पुरणपोळ्या, रंगीबेरंगी मिठाया, भाज्या, चटण्या, कोशिंबिरी, केळीच्या पानावर वाढल्या जात. पानाच्या बाजूला द्रोणात दूध, तूप,ताक, दही व द्राक्षाचे सार वाढलेले असे. पेशवे ब्राम्हण असल्याने त्यांचे सोवळेओवळे अत्यंत कडक.  म्हणून खुद्द पेशवे मेजवानीच्या पंगतीत भोजनाला बसत नसत. दूर उभे राहून अथवा आसनस्थ होऊन पंगतीचा समाचार घेत असत. सवाई माधवराव पेशव्यांच्या प्रथमविवाहप्रसंगी भोजनसमयी पानात खायचे पदार्थ कोठे व कसे वाढायचे याबद्दलची वाढपाची पद्धत नाना फडणीसांनी सुरु केली. पानात वरच्या बाजूला मध्यभागी मीठ, मिठाच्या डाव्या बाजूला चटण्या, कोशिंबिरी, लोणची, पापड, भजी, कुरडया व खीर पुरण असे. मिठाच्या उजव्या बाजूला भाज्या, आमट्या, सार, सांबार, व पक्वान्ने, पानाच्या मध्यभागी पोळ्या, पुऱ्या व भाताचे प्रकार. ही वाढपाची पद्धत महाराष्ट्रात बरीच वर्षे टिकून आहे. 

ब्राम्हण भोजनाच्यासमयी दीड किंवा दोन हात लांब केळीचे पान, दर पानाच्या बाजूला १० ते १२ द्रोण, पानाभोवती रांगोळ्या, बसायला व टेकायला रुप्याच्या फुलांचे शिसवी पाट, चांदीच्या वाटीत गुलाबपाणी अथवा केशरपाणी ( एक पक्वान्न खाल्ल्यावर त्याची चव दुसऱ्या पक्वान्नाला लागू नये म्हणून उजव्या हाताची बोटे स्वच्छ करण्यासाठी ), पानात १० भाज्या.  त्यात तोंडली, परवरे (पडवळ), वांगी या भाज्या नित्य असत. तुरीचे वरण, २ प्रकारची सांबारे, आमटी, १० प्रकारची लोणची ( त्यातील एक साखरेचे गोड ) असे. ३-४ प्रकारच्या फेण्या, साधे वडे, वाटल्या डाळीचे कढीवडे, साजूक तूप, मध्यम गोड मठ्ठा, २ प्रकारच्या खिरी ( शेवयाची व गव्हल्याची ), सपिटाच्या पूर्ण पोळ्या ( पुरण पोळ्या ), खिचडी, ओले हरभरे, पापड, सांडगे, चिकवड्या, मिरगोंडे ( मिरगुंडे ), फळभाजीच्या तळलेल्या काचऱ्या, २० प्रकारच्या कोशिंबिरी, फळभाज्या, पालेभाज्या, उडदाचे किंवा मुगाचे तळलेले किंवा भाजलेले पापड, तळवडे, पंचामृत, रायती, ताकाची कढी, चाकवताचे सांबार, मसालेदार वांगी, सुरण, पांढरा भोपळा,मेथी किंवा आंबाडीची भाजी, चटण्या, कोशिंबिरीत कोथिंबीर लसण , आले, लाल मिरच्या, तीळ, जवस, कारले, आमसुले, हरभऱ्याची डाळ, लिंबे याचा वापर करीत. तसेच आंब्याच्या लोणच्यांचाही समावेश असे. घीवर, आमरस, श्रीखंड ( ही  पक्वान्ने बाजीराव ( दुसरे ) यांनी प्रचारात आणली ) . बासुंदी, केशरी साखरभात, जिलेबी ( हे पक्वान्न मुघल बादशाह बाबर याने सर्वप्रथम भोजनात आणले.) लाडू, पुरणपोळी ( हे पक्वान्न जास्त रूढ होते.) भोजनोत्तर ७ पानांचा प्रसिद्ध कुलपी  विडा दिला जाई. ( पेशवाईत स्त्रियांनाही विडा खायची सवय होती.)

पेशव्यांचा गणपती उत्सवातील ब्राम्हण- भोजनाचा मक्ता ६९०० रु चा असे. त्यात २६ दिवस रोज ५०० ब्राम्हण भोजन करीत असत. यावरून दरपात्री साडेआठ आणे भोजनाचा खर्च पेशव्यांना येत असे. सन १८०७ मधील गणपती उत्सवाच्या भोजनाचा मक्ता दररोज ५०० ब्राम्हण याप्रमाणे दिला होता. तसेच नेवैद्य व थोरले पंगतीसाठी १२५ भोजनपात्रे आणि नैमित्तिक प्रयोजनानिमित्त दरमहा १००० पात्रे मिळून भोजनाचा २९ हजार रुपयांचा वेगळा मक्ता दिला होता. या मक्त्यात वार्षिक ३७ हजार पात्रे होत असल्याने पात्री १२ आणे प्रमाणे भोजनखर्च होत असे !

– भगवंत कुलकर्णी

संग्राहक :– कालिंदी नवाथे 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ विठ्ठलभक्त संत कुर्मदास – शकील मुलाणी ☆ संग्रहिका – सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ विठ्ठलभक्त संत कुर्मदास – शकील मुलाणी ☆ संग्रहिका – सुश्री प्रभा हर्षे ☆

पैठणमध्ये रहाणा-या 22 वर्षाच्या कुर्मदासने आईला हाक मारली…. “ चल लवकर…. कीर्तनाची वेळ झाली…”

आई वैतागून म्हणाली, “ कीर्तन…. कीर्तन…. गुडघ्यापासुन तुला पाय नाहीत, कोपरापासून हाथ नाहीत…. कोण नेईल रोज तुला कीर्तनाला??… 22 वर्षाचा झालायस … आता नाही सहन होत मला तुझं ओझं…”

“ खरं आहे गं !! मी 22 वर्षाचा झालोय.. पण तुझ्या काहीच उपयोगाचा  नाही. वडिलांनी झुरून झुरून प्राण सोडला. आणि मी जिवंत राहिलो… बिन हाताचा, बिन पायाचा…!! पण त्यात माझा काय गं दोष !! फक्त आजच्याच दिवस घेऊन चल मला कीर्तनाला… शेवटचं ..” 

आईचे डोळे डबडबले… शेवटी आई होती ती… आईने अंगावर फक्त लंगोट बांधलेल्या कुर्मदासाला पाठीवर घेतलं… व कीर्तनाच्या ठिकाणी सोडून दिलं… भानुदासमहाराजांचं कीर्तन चालू होतं. भानुदासमहाराज म्हणजे एकनाथांचे पणजोबा !! कीर्तनाला भरगच्च गर्दी… लोटांगण घेत घेत…. पोटावर फरफटत रस्ता काढत काढत कुर्मदास समोर आला…  पहिल्या रांगेत बसला… गळ्यात तुळशीमाळ…. कपाळी टिळा लावलेल्या कुर्मदासावर महाराजांचं लक्ष गेलं…. महाराज म्हणाले, “ आलास कुर्मदासा !!” 

“ हो महाराज….”

“ कुणाबरोबर आलास? ”

“ आईनं आणून सोडलं…”

“ अरे कशाला आईला त्रास दिलास…  आता घरी कसा जाशील? ” ,महाराजांनी विचारलं

“ आता मला घरी नाही जायचं…”

हे ऐकून महाराज म्हणाले, “ अरे… आज काल्याचं कीर्तन !! हे संपलं की आम्ही निघालो पंढरीला… मग तू कुठे जाशील ?”

” महाराज मी पण येऊ का पंढरीला ? “ 

“ अरे तुला कीर्तन ऐकायला आईच्या पाठीवर यावं लागतं… तुला कोण नेईल रे पंढरीला एवढं  लांब ? “

“ तुम्ही फक्त हो म्हणा !! पहा मी येतो का नाही पंढरीला….”

महाराज हसत ” बरं … ये ” म्हणाले…

रात्री सर्व वारकरी झोपलेले पाहून कुर्मदास उठले.. स्नान केलं व फरफटत, लोटांगण घालत पंढरीचा रस्ता धरला… तांबडं फुटलं… लोक उठू लागले. लोकांना विचारू लागला.. “ पंढरीचा रस्ता कोणता हो? “ 

“ इथुन पुढे जा.. पुढे पुन्हा विचारा…” 

सकाळी 10 वाजेपर्यंत कुर्मदासानं बीड गाठलं. वेशीवर हनुमानाच्या मंदिरात जाऊन ओरडू  लागला… “ऐका हो ऐका, भानुदासमहाराजांची दिंडी पंढरीच्या वाटेवर आहे हो ! कुणी कालवण आणावे… कुणी भाकरी आणाव्या ! “  महाराजांची दिंडी येईपर्यंत जेवणाची सोय झाली होती.   भानुदास महाराजांनी बिनाहातापायाच्या कुर्मदासाला पाहून आश्चर्यानं विचारलं…” कुर्मदासा, कसा आलास रे? ”

“ तुमच्या “हो” नं मला आणलं..”  कुर्मदास बोलला..

महाराजांनी सर्वांना भाजीभाकरीचं जेवण दिलं… प्रवचन- कीर्तन झालं- हरिपाठ झाला… महाराज म्हणाले, “ आपला उद्याचा मुक्काम मांजरसुंबा…”

रात्री वारकरी झोपल्यावर , कुर्मदास फरफटत खरडत निघाला… दिवस उगवायला मांजरसुंबा गाठलं… तिथंही त्यानं हाकार दिला व भोजनाची व्यवस्था केली….. एक एक मुक्काम मागे पडू लागला…लोळण घेऊन घेऊन अंगाची पूर्ण चाळण झाली होती… परंतु कुर्मदासाचं ध्येय एकच….. विठुरायाची भेट! !!

येरमाळा, बार्शी… असं करत करत शेवटी कुर्डुवाडीच्या पुढे 7 की.मी वरचं लऊळ गाव आलं … तिथंही कुर्मदासानं भोजन गोळा केलं. दिंडी मागुन आली.. सर्वांची जेवणं झाली… कुर्मदास एका कोप-यात विव्हळत पडला होता. भानुदासमहाराज त्याच्याजवळ आले— त्याला म्हणाले, 

“ कुर्मदासा, आता फक्त एकच मुक्काम राहिला आहे… मग तू तुझ्या विठुरायाला भेटशील…

“ नाही महाराज, आता मी नाही येऊ शकणार पंढरीला…”

“ अरे असं का म्हणतोस कुर्मदासा ? एवढ्या लांब आलास… आता फक्त एका मुक्कामावर आलीय पंढरी !!! “ 

कुर्मदासाला बोलणंसुध्दा असहाय्य झालं होतं… तो पालथा होता तो उताणा झाला… त्याचं सगळं पोट सोलून निघालं होतं. शरीरावर प्रचंड जखमा झाल्या होत्या. त्यात असंख्य खडे रूतलेले होते. रक्त वहात होतं. कुर्मदास थकून गेला होता. बोलण्याचंदेखील त्राण नव्हतं . निघाल्यापासून त्याच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता. सगळ्या दिंडीसाठी त्यानं अन्न गोळा केलं… परंतु स्वतःच्या पोटात मात्र अन्नाचा कणही नव्हता…. महाराजांनी याचं कारण विचारल्यावर तो सहज म्हणाला… 

“ महाराज, मलमूत्र  कोण धुवेल माझं? घरी आई धुवत होती.  इथं कोण ? “… म्हणून अन्न पाणी सोडलं…” 

कुर्मदासाचं हे बोलणं ऐकून भानुदासमहाराजांचे डोळे डबडबले….” कुर्मदासा !! काय केलं हे “ 

“ महाराज, घरी राहून काय केलं असतं…. निदान पंढरीच्या वाटेवर आलो तरी… महाराज, आता फक्त एकच करा… पंढरपूरला गेल्यावर पांडुरंगाला दोनदा नमस्कार करा… आणि त्याला सांगा.. हे पांडुरंगा !! तुझ्या पायाजवळ यायला कुर्मदासाचं पुण्य थोडं कमी पडलं. या जन्मात नाही पहाता आले चरण…. माझा एवढा निरोप द्या…”  असं म्हणून तो तिथंच विव्हळत पडला…. भानुदासमहाराजांचे पाय जड झाले… कुर्मदासाला तसेच सोडून ते पंढरपुरात आले. स्नान करून विठुरायाच्या दर्शनाला उभे राहीले… पांडुरंगाकडे पाहिलं…. पांडुरंगाने भानुदासाकडं पाहिलं…. अंतःकरणातलं चिंतन तिथपर्यंत पोहोचलं…

पाडुरंग रुक्मिणी मातेला म्हणाले, “ रखुमाई,  तु वारी सांभाळ… मी माझ्या भक्ताला– कुर्मदासाला लऊळला भेटायला चाललो…” — विठ्ठल कुर्मदासाजवळ आले. कुर्मदास शुध्द हरपून त्या वाळवंटात पडला होता. जखमांनी अंगाची चाळण झाली होती. शरीरातून रक्त वहातंच होतं. विठ्ठलानं हाक दिली…” कुर्मदासा अरे डोळे उघड…. बघ मी आलोय …”

मोठ्या हिमतीने कुर्मदासानं अर्धवट डोळे उघडले…. पहातो तर प्रत्यक्षात विठुराया समोर उभे होते…”  विठ्ठला… विठ्ठला माझ्या पांडुरंगा “ म्हणत कुर्मदास विठ्ठलाच्या दिशेनं फरफटत लोटांगण घेऊ लागला… एवढ्यात पांडुरंगाने कुर्मदासाकडे धाव घेतली….. त्याचं  शिरकमल आपल्या मांडीवर घेतलं. व म्हणाले, “ कुर्मदासा, तू  जिंकलास. तुझं ध्येय पूर्ण झालं… बघ मी स्वतः– तुझा विठ्ठल, तुझा पांडुरंग तुझ्या भेटीला आलो आहे.”

“ होय विठ्ठला…. आता हीच माझी पंढरी!!! “

कुर्मदासाने डोळे भरून पांडुरंगाला पाहिलं… व अश्रूभरल्या डोळ्यांनी विठ्ठलाला नमन केलं व आपला प्राण सोडला……

धन्य धन्य तो कुर्मदास आणि धन्य त्याची भक्ती!!! ??

मित्रांनो, कुर्मदास जातीने मुस्लीम होता… आजही लऊळ येथे त्याची कबर आहे… आणि त्या कबरीसमोर विठ्ठलाची गोजिरवाणी मूर्ती उभी आहे…. मंदिरावर कळस आणि  कबरीवर गुम्बद आहे…

– शकील मुलाणी

संग्राहक :– प्रभा हर्षे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मिसिंग टाईल्स फिलाॅसाॅफी.. ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

?इंद्रधनुष्य? 

☆ मिसिंग टाईल्स फिलॉसॉफी… ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

काही मानसशास्त्रज्ञांनी एकत्र येऊन एक प्रयोग केला —-

एका नव्याकोऱ्या, आलिशान, चकचकीत आणि देखण्या हॉटेलचा शुभारंभ होता. 

आतून बाहेरुन ते हॉटेल अतिशय भव्यदिव्य आणि सुंदर होते. त्या हॉटेलच्या डिझाईनवर, बांधकामावर, आणि तिथल्या फर्निचरवर पाण्यासारखा पैसा ओतण्यात आला होता. 

हॉटेलच्या उदघाटनाच्या कार्यक्रमाला हजारो लोकांना आमंत्रण दिले गेले होते.

पण मानसशास्त्रज्ञांनी एक प्रयोग म्हणून ह्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा वापर करण्याचे ठरवले.

–त्यांच्या सांगण्यावरून हॉटेलच्या रिसेप्शनमध्ये पोहोचल्याबरोबर दिसणारी, अगदी समोरच्या भिंतीवर लावलेल्या सुंदर टाईल्सच्या डिझाईनमधली एक टाईल, मुद्दामहून बाजूला काढून ठेवण्यात आली होती.  

आता एक वेगळीच गंमत सुरु झाली. हॉटेलमध्ये येणारा प्रत्येक पाहुणा त्या हॉटेलचे सौंदर्य पाहून हरखून गेला खरा, पण आल्याबरोबर काही क्षणात त्यांचे लक्ष मिसिंग टाईलकडेच वारंवार जाऊ लागले—-शेकडो लोकांनी एकमेकांना ती मिसिंग टाईल दाखवली, त्याच्यावर चर्चा केली—

‘ ही टाईल  बसवायची राहिली आहे का ? का ती बाजूला गळून पडली ?’  यावर तावातावाने वादविवाद झडू लागले—–‘ हॉटेल मालकाच्या ह्या एका निष्काळजीपणामुळे हॉटेलच्या सौंदर्याला गालबोट लागले आहे,’  असेही शेकडो जणांनी बोलून दाखवले.

एवढेच नाही, त्या हॉटेलमध्ये आल्यावर पाहुण्यांना कसे वाटले, याविषयी पाहुण्यांना फिडबॅक भरून द्यायचा होता– त्यामध्ये बहुतांश जणांनी अगदी थोडक्यात हॉटेलची डिझाईन, तिथले इंटेरीअर, तिथले लँडस्केपींग आणि तिथल्या महागड्या कलाकुसरीच्या वस्तू ह्याविषयी अगदी थोडक्यात लिहिले, आणि मिसिंग टाईलबद्दल अगदी भरभरून लिहिले. 

त्या हॉटेलमध्ये जागोजागी एकाहून एक देखणी, आकर्षक शिल्प ठेवण्यात आली होती. पाहतच राहाव्यात अशा सुंदर सुंदर पेंटींग्ज होत्या. आकर्षक रंगसंगती असलेल्या अनेक भिंती होत्या.

मानसशास्त्रज्ञांच्या सांगण्यावरुन एका मोठ्या पांढऱ्याशुभ्र भिंतीवर मात्र दोन काळे डाग जाणूनबुजून ठेवण्यात आले होते. खरेतर ते डाग इतके छोटे होते, की एकूण भिंतीच्या दहा टक्के सुद्धा त्यांचा आकार नव्हता.—–पण मिसींग टाईल प्रमाणे ह्या डागांकडेही लोकांचे चटकन लक्ष जाऊ लागले—– लोक एकमेकांना उत्साहाने ते डाग दाखवू लागले— 

‘ सगळे काही इतके छान बनवले, पण हे दोन डाग मात्र तसेच राहिले ‘ ह्याबद्द्ल आश्चर्य व्यक्त करू लागले. 

काही काही अतिउत्साही लोक तर बांधकामातल्या फक्त चुकाच शोधू लागले,

एकमेकांना टाळ्या देऊन हॉटेलमधल्या उणीवा सेलिब्रेट करू लागले.

शेवटी हॉटेलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात मानसशास्त्रज्ञांनी आपल्या प्रयोगाविषयी खुलासा केला. 

——–   

“आल्याबरोबर लॉबीमध्ये दिसणारी मिसिंग टाईल जाणून- बुजून काढून ठेवण्यात आली होती ”,

“मोठ्या पांढऱ्याशुभ्र भिंतीवर दोन डाग मुद्दाम उमटवण्यात आले होते ”,—आणि माणसांचे ह्या दोन्ही गोष्टींवरचे प्रतिसाद जाणून घ्यायचे होते. 

—-आणि रिझल्ट धक्कादायक म्हणावा असाच होता. 

हॉटेलमध्ये स्तुती कराव्यात अशा शेकडो, हजारो गोष्टी मांडून ठेवण्यात आलेल्या असतांनाही,   बहुतांश लोकांनी फिडबॅक फॉर्ममध्ये मिसींग टाईल आणि डागांचाच उल्लेख केला होता. 

मित्रांनो,

कमतरता शोधणं, पाहताक्षणी चुका काढणं, दोष काढून नावं ठेवणं, ही माणसाची वृत्ती जन्मतः असते का ?—तर नाही.

पण जसजसे आपण मोठे होतो, तसतशी आपल्याला कमतरता आणि उणीवा शोधण्याची सवय लागते. 

—मग कधी आपण दुसऱ्यांच्या आयुष्यात असलेल्या वाईट गोष्टींकडे बोट दाखवतो, त्यावर चर्चा करतो. 

—तर कधी आपण स्वतःच्या आयुष्यात असलेले प्रॉब्लेम्स मोजत बसण्यात आपली बहुमूल्य उर्जा आणि बहुमूल्य वेळ खर्च करतो. 

—-“मला योग्य ते शिक्षणच मिळाले नाही.”

—“माझा जन्म गरीब घरात झाला.”

—“माझा जन्म अशा जातीत झाला, जिथे मला संधीच उपलब्ध नाही.”

—“माझे आई वडील शिकलेले नव्हते.”

—“माझ्याजवळ खानदानी संपत्ती नाही, जमीन नाही.”

—“माझ्या वडिलांनी माझ्यासाठी कसलेच बॅकअप तयार केले नाही, मला भांडवल दिले नाही.”

—“आमच्या जवळ बुद्धी नाही.”

—“आमच्या जवळ डिग्री नाही.”

—“घरच्या परिस्थितीमुळे आम्ही मनासारखे शिक्षण घेऊ शकलो नाही.” 

—“मी दिसायला तितकी सुंदर नाही.”

—“माझा जोडीदार मला हवा तसा मिळाला नाही, म्हणुन माझी प्रगती शक्य नाही.”

ह्या आणि अशा कित्येक मिसिंग टाईल्स शोधणं, आणि त्यावर चर्चा करणं, हा मूर्खपणा आहे, असं तुम्हाला वाटत नाही का?

—ज्याला आयुष्यात काही मिळवायचे आहे, तो आजूबाजूला लपलेल्या संधीमध्ये सोने शोधतो. —आणि ज्याला आयुष्यात काही करायचेच नाही, तो मात्र फक्त मिसींग टाईल शोधतो…..!!!

Yogi

संग्राहक : सुनीत मुळे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ लिगो (LIGO)… श्री विनीत वर्तक ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ? 

☆  लिगो (LIGO)… श्री विनीत वर्तक  ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

लिगो म्हणजे Laser Interferometer Gravitational-Wave Observatory.

 जगातील तिसरी लिगो अमेरिकेनंतर नासा भारतात उभारत आहे. अमेरिकेबाहेर पहिल्यांदा अशी अद्यावत लिगो भारतात आपल्या महाराष्ट्रात बनणार आहे. महाराष्ट्राच्या हिंगोली तालुक्याच्या औंढानागनाथ इथे लिगो आकाराला येत आहे. जवळपास १३०० कोटी रुपयांची जगातली महाग अशी प्रयोगशाळा आपल्या महाराष्ट्रात आकाराला येत असताना सो कॉल्ड मराठी आणि महाराष्ट्राचा अभिमान बाळगणाऱ्या लोकांना त्याची पुसटशी कल्पना ही नाही. नासाचे वैज्ञानिक आणि भारतातून डी.ए.ई. चे अधिकारी ह्यांची वर्दळ गेल्या काही वर्षापासून ह्या भागात सुरु आहे. इथल्या जवळपासच्या लोकांना नासा काहीतरी मोठ्ठ प्रोजेक्ट करत आहे इतकीच जुजबी माहिती आहे. पण वैश्विक संशोधनाला  कलाटणी देणारी ही अत्याधुनिक प्रयोगशाळा आपल्या माजघरात आकार घेत असताना त्याची उत्सुकता आणि त्याबद्दल जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. 

लिगो म्हणजे नक्की काय? हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी ग्रॕवीटेशनल वेव्ह (गुरुत्वीय लहरी ) समजून घ्यावी लागेल. विश्वात अश्या अनेक घटना घडत असतात की ज्या माणसाच्या कल्पनेच्या पलीकडल्या आहेत. एकूणच विश्वाची निर्मिती आणि त्यात असलेल्या अनेक गूढ गोष्टी ह्याबद्दल अजूनही बरेच संभ्रम आणि तोकडे ज्ञान आहे. २१ व्या शतकातील तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे शोधाची अनेक नवीन दालन उघडी झाली आहेत. त्यातलं एक दालन म्हणजेच लिगो. गेल्या शतकात विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन ह्यांनी भाकीत केलं होतं की जेव्हा वैश्विक घटना,  म्हणजे कृष्णविवरांच (Black Holes) मिलन किंवा न्युट्रॉन ताऱ्यांची टक्कर अश्या घटना घडतील तेव्हा स्पेस – टाईम मध्ये त्यांच्या प्रचंड वस्तुमानामुळे आणि त्यांच्याकडे असलेल्या प्रचंड गुरूत्वीय बलामुळे लहरी तयार होतील. नदीच्या पाण्यात दगड टाकल्यावर जसे पाण्यात तरंग निर्माण होतात त्याच पद्धतीने ह्या लहरी तयार होऊन विश्वाच्या पोकळीत प्रवास करतील. जेव्हा ह्या लहरी ग्रह तारे ह्यांना आदळतील तेव्हा स्पेस – टाईम मध्ये विश्व जेलीच्या बॉलसारखं  आकुंचन आणि प्रसरण पावेल. ते ज्या लहरींनी होईल त्यांना गुरुत्वीय लहरी असं म्हटलं गेलं .

पूर्ण विश्वात तरंग उमटवायला विश्वात होणारी उलथापालथ ही तितकी प्रचंड असली पाहिजे. गुरूत्वीय लहरी त्यामुळे ओळखणे कठीण आहे. कारण ह्या तरंगामुळे पृथ्वीचं  होणारं आकुंचन आणि प्रसरण हे अवघ्या  एका फोटोन च्या आकाराचे  असू शकते. तसेच ह्या तरंगाची क्षमता ही त्या उलथापालथी वर अवलंबून आहे. विश्वातील ज्या घटना अश्या गुरूत्वीय लहरी निर्माण करू शकतात त्या म्हणजे, दोन कृष्णविवरांच मिलन, दोन न्युट्रॉन ताऱ्यांचं एकमेकाभोवती फिरणं आणि सुपरनोव्हा. तर अश्या घटना जेव्हा विश्वाच्या पटलावर घडतात तेव्हा त्याचे तरंग गुरुत्वीय लहरींच्या स्वरूपात प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात. आधी म्हंटलं तसे पृथ्वीवरही हे तरंग सतत आदळत असतात, पण ते ओळखणे आधी तंत्रज्ञानाला शक्य नव्हतं. कारण एका फोटोनच्या आकारात होणारा फरक मोजणारी यंत्रणा आपल्याकडे नव्हती. पण विज्ञान सतत पुढे जात आहे, त्यामुळे आत्ता आपण तशी यंत्रणा निर्माण करू शकत आहोत. त्यामुळे ह्या लहरी जेव्हा जेव्हा पृथ्वीवर आदळतील, तेव्हा तेव्हा पृथ्वीच्या होणाऱ्या आकुंचन आणि प्रसरण ह्यावरून त्या लहरींचा स्त्रोत,  नक्की केव्हा ही लहर अस्तित्वात आली ह्याबद्दल सांगू शकतो. 

२०१५ साली जेव्हा लिगो तयार होऊन काम करायला लागलं, तेव्हा पहिल्यांदा आपल्याला ही वेव्ह पृथ्वीवर कळाली. ही  गुरुत्वीय लहर १.३ अब्ज वर्षांपूर्वी दोन कृष्णविवरांच्या मिलनातून तयार झाली होती. म्हणजे १.३ अब्ज वर्षापूर्वी निघालेली ही वेव्ह तब्बल ३ लाख किलोमीटर प्रती सेकंद ह्या वेगाने पृथ्वीवर यायला इतकी वर्ष लागली. आत्तापर्यंत प्रकाश हे एकच माध्यम घेऊन आपण विश्वाकडे बघत आलो आहोत. पण जेव्हा ह्या वेव्हनी १.३ अब्ज वर्षापूर्वीची माहिती पृथ्वीवर पोचवली, त्या वेळेस आपण एका नवीन दरवाजातून विश्वाकडे बघू लागलो. आईनस्टाईनने ते स्वप्न बघितले आणि लिगोने तो दरवाजा शोधला. ४ जानेवारी २०१७ ला जेव्हा तिसरी वेव्ह लिगोने शोधली ती तब्बल ३ अब्ज वर्षापूर्वी तयार झाली होती. म्हणजे त्यावेळेचा पूर्ण इतिहास ही वेव्ह आपल्या सोबत घेऊन प्रवास करत होती. ह्या वेव्हच्या अभ्यासातून अनेक गोष्टी आपल्याला समजणार आहेत, ज्याबद्दल आपण अजून अनभिज्ञ आहोत. गुरूत्वाकर्षणाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोनच पूर्ण बदलून जाणार आहे. 

भारतासाठी अभिमानाची गोष्ट ही की लिगो तयार करण्यात भारतीय वैज्ञानिक अग्रेसर आहेत. आईनस्टाईनच्या ज्या थेअरी ऑफ रिलेटीव्हीटीवर आपण आज हे शोधू शकलो आहेत, ते लिगो उपकरण बनवण्यात भारतीय वैज्ञानिकांचे योगदान प्रचंड आहे. जगातील १००० हून अधिक वैज्ञानिकात भारताच्या अनेक संशोधकांनी आपले योगदान दिले आहे. लिगोमध्ये दोन आर्म काटकोनात चार किलोमीटरचे असतात. जेव्हा  ग्रॅव्हिटेशनल वेव्ह पृथ्वीवर आदळते, तेव्हा तिच्या आदळण्याने ह्या आर्मच्या लांबी मध्ये फरक होतो. हाच फरक लेझर, मिरर आणि अतिसूक्ष्म बदल नोंदवणाऱ्या उपकरणांनी बंदिस्त केला जातो. आनंदाची बातमी अशी की अस लिगो भारतात बांधण्यासाठी युनियन केबिनेट ने फेब्रुवारी २०१६ मध्ये मंजुरी दिली आहे. ६७ वैज्ञानिक १३ प्रयोगशाळा, जश्या ( DAE,TIFR, IIT Bombay, IIT Madras, IUCAA Pune, RRCAT Indore, UAIR Gandhinagar, IIT Gandhinagar, IIT Hydreabad etc.)  ह्यात सहभागी आहेत. २०२२ मध्ये लिगो तयार झाल्यावर अश्या वेव्हचा अभ्यास भारतीय वैज्ञानिकांना भारतात आणि महत्वाचे  म्हणजे महाराष्ट्रात करता येणार आहे. 

आईनस्टाईनने बघितलेले  आणि अभ्यासलेले स्वप्न आता प्रत्यक्षात आपण अनुभवतो आहोत. ह्या विश्वाच्या पसाऱ्यात आपल्याला माहित असलेल्या गोष्टी खूप कमी आहेत. आजवर प्रकाश ह्या एकाच दरवाज्याने आपण विश्व बघत आलो. पण आता ग्रॕव्हीटेशनल वेव्हमुळे अजून एक दरवाजा उघडला गेला आहे. ह्यातून विश्व समजून घेणे मोठे रंजक असणार आहे. ह्यात भारतीय वैज्ञानिक आणि संशोधक तितकाच समतोल वाटा उचलत आहेत हे बघून खूप छान वाटले. विश्वाच्या ह्या नव्या दरवाज्याचे स्वप्न बघणारा आईनस्टाईन आणि ते प्रत्यक्षात उतरवणारे “ लिगो “चे सर्वच भारतीय संशोधक ह्यांना सलाम.    

– श्री विनीत वर्तक

(माहिती स्त्रोत :- गुगल, नासा) 

संग्राहक :- मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ परशुराम –बुरोंडी दापोली ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ? 

☆ परशुराम –बुरोंडी दापोली  ☆ श्री सुहास सोहोनी ☆ 

स्व हिमतीवर भगवान परशुरामांचा पुतळा उभारुन आपल्या आराध्यदेवतेप्रती भक्तीचा महापूर वाहणाऱ्या ‘परशुराम भूमी’ प्रांगणाची निर्मिती करणाऱ्या आणि भगवान परशुरामांची भव्य मूर्ती उभारणा-या गानू परिवाराला कितीही धन्यवाद दिले, तरी अपूर्ण राहतील…

दापोलीतून कोळथरेला निघताना बुरोंडी दापोली लागते. तिथे भगवान परशुरामांचा भव्य पुतळा आहे. फारसा गाजावाजा न करता ही निर्मिती सुरु आहे.. आजूबाजूला पहाताना भव्य मूर्ती दिसते, ती पण भगवान परशुरामांची…. तिथे माणूस प्रचंड आनंदाने उतरतोच …..

ज्ञान, भक्ती, त्याग आणि सृजन यांचा साक्षात्कार म्हणजेच विष्णूंचा सहावा अवतार — भगवान परशुराम ! आपल्या युगातील अत्याचारी आणि समाजविघातक शक्तींचा नाश करुन तब्बल २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केलेले थोर पराक्रमी व समाजाला सुखाचा मार्ग दाखविणारे——- चिरंजीव भगवान परशुराम ! तपःसाधना, शस्त्रविद्या आणि वेदधर्म यांचा आद्य संगम म्हणजे—– भगवान परशुराम ! 

अशा भगवान परशुरामांचे मूर्त रुपात दर्शन घडावे आणि ते तरुण पिढीसाठीही प्रेरणादायी ठरावे, या हेतूने पुण्यातील न्यू मॉडर्न ऑप्टिशियन्सचे मालक – सौ.अश्विनी आणि अनिल गोविंद गानू यांनी परशुरामभूमीची निर्मिती केली आहे…..

४० फूट व्यासाच्या अर्धगोल पृथ्वीवर २१ फूट उंची असलेली परशुरामांची ही भव्य मूर्ती उभी असून फेरोक्रीट पद्धतीने हा पृथ्वीचा अर्धगोल बांधला आहे. भगवान परशुरामांचे हे भव्य शिल्प उत्तराभिमुख असून ‘तामसतीर्थ’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या समुद्रकिना-याचे दर्शन येथून होते. समुद्राच्या तेवढ्याच भागाचे पाणी तांबडे दिसते, म्हणून त्याला ‘तामसतीर्थ’ म्हणतात.

हे कमालीची स्वच्छता असलेले निसर्गरम्य ठिकाण  आहे. गोलाकार पृथ्वीच्या आत शिरल्यावर ध्यानगुंफा आहे. तिथे बसलात की, काहीही बोला – प्रतिध्वनी उमटतात. परशुरामांच्या चरणी लीन होतात.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा भव्य पुतळा, त्याची निगा आणि इतर खर्च प्रचंड असूनही,  येथे कसलेही प्रवेशशुल्क नाही…..

केवळ ‘जय परशुराम’ करुन न थांबता, प्रत्यक्षात भव्य मूर्ती उभारणा-या गानू परिवाराला लाखो धन्यवाद. सगळ्यांकडे खूप काही असते, पण द्यायला उंच मन लागते…. सभोवतालचा आल्हाददायी परिसर मन तजेल करतो. मनाला शांतता देणाऱ्या या परशुराम-भूमीच्या निर्मितीला आठ वर्षे झाली आहेत. 

माहिती संग्राहक : — सुहास सोहोनी

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ विष्णू सहस्त्र नामाची सुरस माहिती ☆ प्रस्तुती – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

?इंद्रधनुष्य? 

☆ विष्णू सहस्त्र नामाची सुरस माहिती ☆ प्रस्तुती – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆ 

पूर्वी एकदा १९४० किंवा ५० च्या दशकात कोणीतरी महापेरियार कांची धर्माचार्य चंद्रशेखर सरस्वती ह्यांची मुलाखत घेत होते. ते सद्गृहस्थ मुलाखत ध्वनिमुद्रित करीत असताना टेप रेकॉर्डरचा वापर करीत होते.  तेव्हा पेरियार ह्यांनी प्रश्नार्थक पवित्रा घेत विचारले, ” कोणाला सर्वात जुन्या टेपरेकॉर्डरविषयी माहिती आहे कां ???”

ह्या नंतर त्यांनी दुसरा प्रश्न विचारला, “विष्णू सहस्त्र नाम आपल्या पर्यंत कसे आले ???

कुणीतरी म्हणाले, ” पितामह भीष्म ह्यांच्यामुळे ते आपल्याला प्राप्त होऊ शकले”, ह्या वर सर्वांचे एकमत झाले.

त्यावर महापेरियार ह्यांनी पुढचा प्रश्न केला, ” युद्धभूमीवर सगळ्यांनी भीष्म ह्यांना विष्णू सहस्त्रनाम म्हणताना ऐकले तेव्हा ते कोणी टिपून घेतले ???”

पुन्हा एकदा शांतता पसरली. तेव्हा महापेरियार ह्यांनी स्पष्ट केले, ” जेव्हा भीष्म कृष्णस्तुतीपर विष्णू सहस्त्रनाम म्हणत होते, तेव्हा कृष्ण, व्यास ह्यांच्यासमवेत सर्वजण त्यांच्याकडे पहात होते. जेव्हा त्यांनी १००० विष्णूनामे म्हणून पूर्ण केली, तेव्हा सर्वजण त्यांच्याकडे आश्चर्यचकित होऊन पहातच राहिले. सर्वात पहिले युधिष्ठिर भानावर येऊन ह्यावर संमिश्र प्रतिक्रिया देते झाले, ” पितामह ह्यांनी वासुदेवाची उत्कृष्ठ अशी रमणीय १००० नावे पठण केली, आपण सर्वजण फक्त ऐकतच राहिलो.  पण कोणी ती टिपून घेतली नाहीत. आता त्याचा क्रम पण आपण गमावला”. तेव्हा सगळेजण कृष्णाकडे मोठ्या आशेने वळून मदतीची याचना करु लागले. नेहमीप्रमाणे कृष्ण म्हणाला,

” मलासुद्धा तुम्हा सर्वांप्रमाणे ऐकलेली रचना आवडली.  पण आपण काय करू शकतो ???”

तेव्हा सर्वजण अमूल्य अश्या रचनेच्या पुनर्प्राप्तीसाठी कृष्णाची आर्जवं करु लागले.  तेव्हा वासुदेव उदगारले, ” हे फक्त सहदेव पुनर्प्राप्त करू शकेल आणि व्यास ते टिपून घेतील.” सर्वजण, सहदेव हे कार्य कश्याप्रकारे करु शकेल ??? हे जाणून घेण्यासाठी उत्सुक झाले, तेव्हा कृष्णाने उत्तर दिले, ” आपल्या सर्वांमध्ये सहदेवाने एकट्याने सूत स्फटिक धारण केले आहे. जर त्याने शिवाची प्रार्थना केली आणि ध्यान केलं, तर तो स्फटिकाला ध्वनीलहरींमध्ये रुपांतरीत करु शकेल, आणि व्यास ते टिपून घेऊ शकतील”.

तेव्हा सहदेव आणि व्यास, जिथे त्यांनी भीष्म पितामहांना सहस्त्र नाम म्हणताना ऐकले होते, त्याच ठिकाणी खाली बसले. सहदेवाने स्फटिकाच्यामार्फत ध्वनीलहरींद्वारे सहस्त्रनाम प्राप्त करण्यासाठी शिवाचे ध्यान आणि प्रार्थनेला सुरवात केली.

स्फटिकाची प्राकृतिक रचना शांत वातावरणामध्ये ध्वनी हस्तगत करू शकेल अशी असते. जो श्वेतांबर आणि स्फटिकासमान आहे, अशा शिवाचे उचित असे ध्यान केल्यास ह्या ध्वनीलहरी पुनर्प्राप्त होऊ शकतात .

अश्याप्रकारे विश्वातील सर्वात पहिल्या “ स्फटिक ” टेपरेकॉर्डरमार्फत रचना ऐकून व्यासांनी ती

टिपून आपल्यापर्यन्त विस्मयकारक असे विष्णू सहस्त्रनाम पोहोचवले– हे जेव्हा महापेरियार ह्यांनी स्पष्ट केले तेव्हा सर्वजण स्तंभित होऊन ऐकतच राहिले..

आपण आज वापरतोय त्या हार्डडिस्क, मेमरी कार्ड मध्ये स्फटिकाचाच वापर होतोय, याचेशी तंतोतंत जुळणारी ही माहिती आहे. Quartz stone or SiO2 or silicon म्हणजेच स्फटिक…

साभार

ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः ।।

प्रस्तुती : श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print