मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ A N G A A R… आणि एक नवीन देश निर्माण झाला… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ A N G A A R… आणि एक नवीन देश निर्माण झाला… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

३ डिसेंबर १९७१ रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्धाला तोंड फुटले…

त्यावेळी पूर्व आणि पश्चिम (आजचा बांग्लादेश) पाकिस्तानच्या समुद्री वाटा संपूर्ण तोडण्याची (complete naval blockade) महत्वाची जबाबदारी भारतीय नौदलाकडे सोपवण्यात आली.  

पाकिस्तानच्या हल्ल्याला चोख सडेतोड उत्तर देण्यासाठी नौदलाच्या इतिहासातील घातक आणि धाडसी हल्ला करण्यास भारतीय नौदल सज्ज झाले. 

यासाठी गरज होती योग्य वेळ साधून अचानक हल्ला करण्याची, कारण हल्ला होणार होता तो थेट पाकिस्तानच्या कराची बंदरावर ! कराची बंदर हे पाकच्या नौदलाचे व संपूर्ण व्यापाराचे प्रमुख बंदर. येथूनच पाकिस्तानला अमेरिका व ब्रिटन या देशांकडून युद्धासाठी मदत मिळत असे व पूर्व पाकिस्तानला पाठवली जात असे. असे हे कराची बंदरच नष्ट करून पाकचा कणाच मोडण्याचं ठरलं. 

ह्या मोहिमेला नाव देण्यात आले “Operation Trident“. 

यासाठी भारतीय नौदलाने निवड केली ती आकाराने छोट्या, तेज व चपळ अशा क्षेपणास्त्रवाहू Osa-class missile boat जहाजांची –                                          

१) INS Nipat, २) INS Veer, ३) INS Nirghat, ४) INS Vinash, ५) INS Nashak, ६) INS Vidyut, ७) INS Vijeta, ८) INS Nirbhik

ह्या जहाजांची मर्यादा बघता ही जहाजे कराची बंदराच्या दक्षिण दिशेला दुसऱ्या जहाजांनी ओढून (TOE) नेण्याचे ठरले. तिथून पुढे हल्ला करून ती सर्व जहाजे तीन दिशांना जाणार होती. नुकतेच रशियाहून प्रशिक्षण पूर्ण करून आलेल्या, उत्तम अस्खलित रशियन भाषा बोलणाऱ्या अधिकारी वर्गाची निवड करण्यात आली. मोहिमेदरम्यान आपल्या सर्व जहाजांना रेडिओ वापरण्यास मनाई होती. गरज भासल्यास संभाषण हे रशियन भाषेतूनच करावे, जेणेकरून पाकला ह्या मोहिमेचा पत्ता लागणार नाही आणि रशियन नौदल समजून तो कोणतीही हालचाल करणार नाही, ह्या साठीचा हा डाव होता. 

पहिला हल्ला :–  ४ डिसेंबर १९७१ च्या रात्री ही सर्व जहाजं सौराष्ट्रच्या किनाऱ्याजवळून कराचीच्या दिशेने निघाली. कराचीजवळ येताच रडार पिंग करू लागले. त्यांना काही पाकिस्तानी जहाजं तिथे गस्त घालताना आढळली.

सुमारे १०.४५ ला INS Nirghat ला हल्ला करण्याचे आदेश मिळाले. तात्काळ पहिलं क्षेपणास्त्र सुटलं आणि जाऊन पाकिस्तानी जहाजावर धडकलं. ते जहाज होतं Battle-class Destroyer PNS Khaibar.– PNS Khaibar ने बुडता बुडता पाकिस्तानी नौदलाला रेडिओ संदेश पाठवला, “enemy aircraft attack-number one boiler hit – ship sunk…” (PNS Khaibar ला त्यांच्यावर हल्ला कुठून कसा झाला हेही समजलं नव्हतं.)

सुमारे ११.२० वाजता कराचीपासून अवघ्या ३२ मैलांवर असलेल्या INS Veer ला अजून एक जहाज दिसलं, ते होतं  PNS Muhafiz (Adjutant-class mine-sweeper) — INS Veerने क्षणाचाही विलंब न करता २ क्षेपणास्त्रे PNS Muhafiz च्या दिशेने सोडली. पुढची ७० मिनिटं Muhafiz जळत होतं. 

दरम्यान INS Nipat च्या अवघ्या २६ मैलावर एक जहाज टप्प्यात आलं, ते होतं venus challenger – पाकिस्तानसाठी दारुगोळा आणि हत्यारं आणतानाच नेमकं सापडलं. INS Nipat ने त्या जहाजाला तळ दाखवला. 

त्याच पाठोपाठ पाकिस्तानी PNS ShahJahan (British C class destroyer) यावर हल्ला केला. 

PNS ShahJahan बुडालं नाही, पण अगदीच निकामी झालं आणि INS Nipat तडक कराचीच्या दिशेने वेगात निघालं आणि अवघ्या १४ मैलांवरून कराची बंदराच्या मुख्य मार्गाच्या दिशेने क्षेपणास्त्र सोडलं. —

(जगातील युद्धाच्या इतिहासात कोणत्याही नौदलाने जहाजावरून जहाजावर मारा करण्यासाठी असलेल्या क्षेपणास्त्राचा उपयोग जमिनीवरील लक्ष्य भेदण्यासाठी आजपर्यंत केलेला नाही. भारतीय नौदलाने ते यशस्वीरित्या करून दाखवलं.) सुमारे ११.५९ वा.कराची बंदरातील भल्या मोठ्या तेलाच्या टाक्यांना त्यांनी लक्ष्य बनवलं. एक टाकी फुटताच इतर टाक्या फुटू लागल्या. संपूर्ण कराची हादरलं. मध्यरात्री भरदिवसासारखा उजेड पसरला. कराची बंदर धडधडून पेटत होतं.)

— आणि भारतीय नौदल मुख्यालयाला पहिला रेडिओ संदेश पाठवण्यात आला —-A N G A A R..

हा कोड होता दिलेली कामगिरी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा ! 

दुसऱ्या दिवशी ५ डिसेंबर रोजी भारतीय वायुसेनेने उरलंसुरलं कराची ठोकून काढलं.

८ डिसेंबरच्या रात्री पुन्हा एकदा भारतीय नौदलाच्या फक्त तीन जहाजांनी Operation Pythonच्या अंतर्गत कराचीवर हल्ला चढवला. ह्या सततच्या हल्ल्यांमुळे अर्धं पाकिस्तानी नौदल रसातळाला गेलं आणि बरंचसं निकामी झालं. उरलेलं पूर्णपणे हादरून गेलं होतं. 

अश्या ह्या भारतीय नौदलाच्या कामगिरीसाठी आणि ह्या विजयासाठी ‘ ४ डिसेंबर हा भारतीय नौसेना दिवस ‘ म्हणून साजरा होतो आणि ज्या जहाजांच्या ताफ्याने हा हल्ला केला, त्यांना तेव्हापासून नौदलात killer squadron संबोधलं जाऊ लागलं.  

पुढे १६ डिसेंबर १९७१ ला पाकिस्तानने संपूर्ण शरणागती पत्करली आणि —-

आणि एक नवीन ‘बांग्ला देश’ निर्माण झाला… 

भारतीय नौदलाच्या  या अतुलनीय कामगिरीला विनम्र अभिवादन…!  जय हिंद !!!  

लेखक : अज्ञात

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शहामृगाचे प्रेम… अज्ञात ☆ संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ शहामृगाचे प्रेम… अज्ञात ☆ संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर ☆ 

तुम्हांला शहामृगाच्या बाबतीतली एक गोष्ट माहिती आहे का ??

नर किंवा मादी शहामृग आयुष्यात एकदाच आपल्या साथीदाराची निवड करतात….

साथीदार मिळाला की ते जिवंत असेपर्यंत एकमेकांबरोबरच राहतात, एकमेकांची साथ सोडत नाहीत,,,

पण जंगलात रहाताना काही कारणाने जर एकाचा मृत्यू झाला, आणि तो मृत्यू दुसऱ्याने पहिला तर तो जिवंत असलेला शहामृग अन्नत्याग करतो ताबडतोब आणि बरोबर वीस दिवसांनी मरतो…..

बापरे,,,, ही माहिती मला जगप्रवासी सुधीर नाडगौडा यांच्याशी बोलताना कळली आणि मी अस्वस्थ झाले…

हा विषय मनातून जाईना….! इतके प्रेम……!! इतकी निस्सीम साथ पक्षाच्या विश्वात असते का…….????

Great……….¡¡

शहामृगाला आपल्या जोडीदाराचा मृत्यू सहनच होत नाही….पण तो मृत्यू त्याला कळलाच नाही तर तो जगतो….

हे जग वेगळेच आहे…….

….. 

रोज सकाळी फिरायला जाते तेव्हा अशा माणसातल्या शहामृगाच्या जोड्या मला भेटतात….

मला खूप आवडतं त्यांच्याकडे पहायला.

….

बरोबर साडेआठ वाजता एक आजोबा टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट, स्वेटर घालून आपल्या केस पिकलेल्या सुरकुतलेल्या गोड आजीच्या हाताला धरून हळूहळू येतात…….दोघांनाही कमी ऐकायला येते बहुतेक……..मोठ्यांदा बोलतात.

आजोबा काहीतरी विचारतात…आज्जी वेगळेच ऐकतात….मग…काहीतरी बोलतात…. ते ऐकून आजोबा आज्जीकडे बघून मस्त हसतात….

…. मला त्यांच्यात शहामृग दिसतो.

मला पुण्यातले आज्जी आजोबा फार आवडतात, बालगंधर्वला नाटक बघायला जाते तेव्हा अशा शहामृगाच्या जोड्या असतातच…… आज्जीच्या छोट्याशा अंबाड्यावर किंवा पोनीवर मोगऱ्याचा मस्त सुगंधी गजरा असतो…

आजोबांनी आपल्या थरथरत्या हातानी तो माळलेला असतो, आजोबा कडक इस्त्रीच्या शर्ट पॅन्टमध्ये असतात.

आज्जी सलवार कमीज नाहीतर नाजूक किनार असलेल्या साडीत असतात……मध्यंतरात एकमेकांचा हात धरून ते हळुहळु बाहेर जातात……बटाटेवडा खातात…कॉफी पितात.  मग परत नाटक पाहायला आत येतात….

नाटक संपलं की एकमेकांना सांभाळत रिक्षातून घरी जातात……किती रसिक म्हातारपण आहे हे….!! 

एकदा मिलिंद इंगळेच्या गारवा या फेमस गाण्याच्या प्रोग्रामला गेले होते. तर त्या प्रोग्रॅमला निम्याहून अधिक शहामृगाच्या जोड्याच होत्या….. यांना पिकली पानं म्हणणं म्हणजे त्यांच्यांतल्या तरुण मनाचा अपमान करण नाही काय…!….. उद्या जर अरजितसिंगच्या गाण्याच्या कार्यक्रमात हे शहामृग दिसले तर मला बिलकुल आश्चर्य वाटणार नाही….

पुण्यातले आजीआजोबा अभीं तो, ‘मै जवान हूं’ या मानसिकतेतच राहतात, नव्हे तसे जगतात…

… माझं काय आता…. वय झालं. संपल सगळं अस जगणं यांना मान्यच नाही,,,

my God,,, इतकी पॉझिटिव्ह एनर्जी येते कुठून यांच्यात…..

वृथ्दापकाळ असा गोङ असावा ; असे ज्यांना वाटत असेल , त्या पती पत्नींनी त्यांच्यातील नाते – तरुणपणापासूनच जपा . सुखी व्हाल .

किती मस्त आहे ना हे शहामृगी प्रेम !!!!!!!!!!! 

अ ज्ञा त 

संग्रहिका : सुप्रिया केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हृदयस्थ साक्षात्कार…. सुश्री संपदा वागळे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ हृदयस्थ साक्षात्कार…. सुश्री संपदा वागळे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

वरवर पहाता एखाद्याच्या अंतःकरणाची कल्पना येणं कठीण ! नारळाच्या कठीण कवचाआड लुसलुशीत खोबरं दडलेलं असतं किंवा फणसाच्या‌ काटेरी आवरणाखाली गोड गरे लपलेले असतात, तद्वत अनेकदा बाहेरून कडक,रागीट वाटणाऱ्या व्यक्तीच्या आतही ममतेचा झरा झुळूझुळू वहात असतो. जेव्हा हा हृदयस्थ साक्षात्कार होतो तेव्हा नतमस्तक होणं एव्हढंच आपल्या हाती उरतं.

मला आलेला हा अनुभव आहे महान अभिनेता विक्रम गोखले यांच्या बद्दलचा. सतरा वर्षांपूर्वीचा हा अनुभव त्यांच्या जाण्याने मनात पुन्हा एकदा लख्ख जागा झाला.

२००५ची गोष्ट. तेव्हा माझे यजमान कॅन्सरशी झगडत होते. ऑपरेशन झालं होतं. केमो सुरू होत्या. खूप अशक्तपणा आला होता. जेमतेम घरातल्या घरात फिरत होते इतकंच. एखादा दिवस आशा पालवीत उगवायचा तर पुढचा दिवस निराशेच्या खाईत ढकलायचा.असंच एकदा एका उत्साहाच्या दिवशी सकाळी पेपर वाचताना ते  म्हणाले, ” येत्या शनिवारी गडकरीला विक्रम गोखल्यांचं ‘ खरं सांगायचं तर ‘ हे नाटक लागलंय. बरोबर सुप्रिया पिळगावकर आहे, म्हणजे मेजवानी आहे. वेळही रात्री साडेआठची आहे. म्हणजे आपली बॉडीगार्डही (सीए होऊन नुकतीच कामाला लागलेली आमची मुलगी,पल्लवी ) बरोबर असणार.हे जमवूया आपण…”

माझ्या समोरील अनेक प्रश्न मी गिळून टाकले. वाटलं न जाणो, सध्याच्या तणावयुक्त दिवसात हे नाटक थोडा ओलावा घेऊन येईलही. त्यानंतर एसीमध्ये तीन तास एका जागी बसण्यासाठी आमची तयारी सुरू झाली.

 बनियन, वर स्वेटर, त्यावर फुलशर्ट, पायात गुढघ्यापर्यंतचे वुलन सॉक्स, बूट असा पेहराव चढवून हे सज्ज झाले. मधे खाण्यासाठी नाचणीची बिस्किटे, राजगिऱ्याची चिकी, आवळा सुपारी, पाण्याची बाटली, खोकला आला तर खडीसाखर, उलटी आली तर प्लॅस्टिक पिशवी इत्यादींनी माझी पिशवी गच्च भरली.

नाटक रहस्यप्रधान होतं. बघता बघता हे त्यात गुंतून गेले. आमचं मात्र अर्ध लक्ष यांच्याकडेच होतं. बऱ्याच दिवसांनी मिळालेलं वेगळं वातावरण,वेगळा विषय यामुळे स्वारी खुशीत होती. तो आनंद आमच्याही तनामनावर पसरला.

नाटक संपल्यावर पल्लवी म्हणाली, ” तुम्ही दोघं गेटजवळ थांबा. मी गाडी काढून तिथे येते.” आम्ही बरं म्हणून गेट जवळ तिची वाट पहात थांबलो. पण एक एक करत सर्व गाड्या गेल्या, तरी हिचा पत्ता नाही. म्हणून काय झालं ते बघायला आम्ही पार्किंगच्या जागी गेलो. बघतो तर तिथे तिची गाडीशी झटापट सुरू होती. आमच्या त्या जुन्या मारुती 800 ने असहकार पुकारला होता. हे पाहताच यांच्यातील इंजिनिअर जागा झाला.

“स्पार्क प्लग गेलाय का बघ, बॉनेट उघड. पाणी संपलय का पहा…” सूचना सुरू झाल्या आणि तिची निमूट अंमलबजावणी.

होता होता पार्किंगमध्ये फक्त आम्ही तिघेच उरलो . आमच्या गाडीच्या मागे एकच आलिशान कार उभी होती. नाटक संपून अर्धा तास झाला. घड्याळाचा काटा पावणेबारावर गेला. मी यांना म्हटलं, ” अहो,राहू दे ना आता. आपण गाडी इथेच सोडून रिक्षाने घरी जाऊया. उद्या मेकॅनिकला पाठवून गाडी आणू. आणखी उशीर झाला तर रिक्षाही मिळायची नाही…”

पण यांच्यातील इंजिनियरला एव्हाना चेव चढला होता. ते माझं काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. इतक्यात कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज आला. बघितलं तर खुद्द विक्रम गोखले आपल्या एका सहकाऱ्याशी बोलत आमच्याच दिशेने येत होते. म्हणजे मागची गाडी त्यांचीच होती तर ! आम्हाला अगदी कानकोंडं झालं. मी खालमानेने त्यांची गाडी काढायला जागा आहे ना हे बघून घेतलं. वाटलं,’ हे लौकर कटलेले बरे, त्यांच्यासमोर शोभा नको.’ म्हणून आम्ही तिघेही बॉनेटमधे डोकं घालून ते जाण्याची वाट बघत राहिलो.

पण झालं भलतंच ! कानांवर शब्द आले, ‘ गाडी बंद पडलीय का ?’ चक्क विक्रम गोखले आम्हाला विचारत होते.

मी मानेनेच हो म्हटलं. यांच्याकडे पाहून एकंदर परिस्थिती त्यांच्या लक्षात आली असावी. आम्हाला काही कळायच्या आत त्यांनी आमच्या गाडीचा ताबा घेतला. आजूबाजूला शोधून एक तार आणली. कसल्याशा पॅकिंगसाठी रुपयाचं नाणं काढलं. आपल्या सहकलाकाराला हाताशी धरून रात्री बारा वाजता त्यांचा हा खटाटोप सुरू झाला.

साडे तीन तासांच्या तणावपूर्ण नाटकानंतर हा अभिनयाचा बादशहा पुसटशीही ओळख नसलेल्या प्रेक्षकांसाठी जीवाचं रान करत होता. काटा साडेबारावर सरकला. विक्रम गोखल्यांचे दोन्ही हात काळे झाले होते. तरी ते सोडून द्यायला तयार नव्हते. आम्ही पूर्ण संकोचून बाजूला उभे. वाटलं म्हणावं, ” मला तुमचं काम खूप आवडलं, मी तुमची फॅन आहे…” पण वाटलं ,या क्षणी हे अगदीच कृत्रिम होतंय. इतक्यात ते आपल्या मित्राला म्हणाले, ‘ आपण ढकलतंत्र वापरून बघूया.’  त्या बिचाऱ्याने मान हलवली. तोही आमच्यासारखाच हतबल ! हा नटसम्राट त्या जुन्या गाडीच्या व्हीलवर बसला, आणि त्यांचा तो मित्र व हाक मारून बोलवलेला वॉचमन दोघे गाडी ढकलू लागले.

माणुसकीचा हा गहिवर पाहून त्या गाडीलाही पाझर फुटला. इंजिनाने फुर्र…फुर्र करत साथ दिली. गाडी तशीच चालू ठेवत त्यांनी पल्लवीला भरपूर सूचना दिल्या. सिग्नलला देखील इंजिन बंद करू नको हे बजावून सांगितलं. रंगायतनच्या इमारतीला वळण घेऊन आम्ही बाहेरच्या रस्त्याला लागेपर्यंत ते तिथेच उभे होते.

जे घडलं त्यातून भानावर यायला आम्हाला पाच मिनिटं लागली. त्यांचे आभार मानायचेही राहून गेले.अर्थात त्या शब्दांची गरज होती असं नाही मला वाटत.

त्यावेळी मोबाईल नसल्यामुळे या प्रसंगाचा फोटो काढायचा राहिला. पण त्या भेदक नजरेच्या, भारदस्त व्यक्तिमत्वाच्या हळव्या हृदयाची अप्रतिम छबी मात्र काळजावर निरंतन कोरली गेली.

लेखिका : सुश्री संपदा वागळे

waglesampada@gmail.com

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १० (इंद्र सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १० (इंद्र सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १० ( इंद्र सूक्त )

ऋषी – मधुछंदस् वैश्वामित्र : देवता – इंद्र 

मधुछन्दस वैश्वामित्र ऋषींनी पहिल्या मंडळातील दहाव्या सूक्तात इंद्र देवतेला आवाहन केलेले आहे. त्यामुळे हे सूक्त इंद्रसूक्त म्हणून ज्ञात आहे. याच्या गीतरूप भावानुवादाच्या नंतर दिलेल्या लिंकवर क्लिक केले म्हणजे हे गीत ऐकायलाही मिळेल आणि त्याचा व्हिडीओ देखील पाहता येईल. 

मराठी भावानुवाद : डॉ. निशिकांत श्रोत्री 

गाय॑न्ति त्वा गाय॒त्रिणोऽ॑र्चन्त्य॒र्कम॒र्किणः॑ ।

ब्र॒ह्माण॑स्त्वा शतक्रत॒ उद्वं॒शमि॑व येमिरे ॥ १ ॥

गायत्रीतुन भक्त उपासक तुझेच यश गाती

अर्कस्तोत्र रचुनी ही अर्कअर्चनेस अर्पिती

पंडित वर्णित तुझीच महती तुझेच गुण गाती

केतनयष्टी सम ते तुजला उच्च स्थानी वसविती  ||१||

यत्सानोः॒ सानु॒मारु॑ह॒द्भूर्यस्प॑ष्ट॒ कर्त्व॑म् ।

तदिन्द्रो॒ अर्थं॑ चेतति यू॒थेन॑ वृ॒ष्णिरे॑जति ॥ २ ॥

भक्त भटकला नगानगांच्या शिखरांवरुनीया

अगाध कर्तृत्वा इंद्राच्या अवलोकन करण्या 

भक्ती जाणुनि वर्षाधिपती प्रसन्न अति झाला

सवे घेउनीया लवाजमा साक्ष सिद्ध झाला ||२|| 

यु॒क्ष्वा हि के॒शिना॒ हरी॒ वृष॑णा कक्ष्य॒प्रा ।

अथा॑ न इन्द्र सोमपा गि॒रामुप॑श्रुतिं चर ॥ ३ ॥

घन आयाळी वर्षादायक अश्व तुझे बहु गुणी

धष्टपुष्ट देहाने त्यांच्या रज्जू जात ताठुनी 

जोडूनिया बलशाली हयांना रथास आता झणी

प्रार्थनेस अमुच्या ऐकावे सन्निध रे येउनी ||३||  

एहि॒ स्तोमा॑ँ अ॒भि स्व॑रा॒भि गृ॑णी॒ह्या रु॑व ।

ब्रह्म॑ च नो वसो॒ सचेन्द्र॑ य॒ज्ञं च॑ वर्धय ॥ ४ ॥

अमुचि आर्जवे सवे प्रार्थना ऐका धनेश इंद्रा

प्रसन्न होऊनी प्रशंसून त्या त्यासि म्हणा भद्रा

अमुची अर्चना स्वीकारा व्हा सिद्ध साक्ष व्हायला 

यज्ञा अमुच्या यशप्राप्तीचे आशीर्वच द्यायला ||४||

उ॒क्थमिन्द्रा॑य॒ शंस्यं॒ वर्ध॑नं पुरुनि॒ष्षिधे॑ ।

श॒क्रो यथा॑ सु॒तेषु॑ णो रा॒रण॑त्स॒ख्येषु॑ च ॥ ५ ॥

ऐका याज्ञिक ऋत्वीजांनो इंद्रस्तोत्र गावे

सर्वश्रेष्ठ ते सर्वांगीण अन् परिपूर्ण ही असावे

सखेसोयरे पुत्रपौत्र हे असिम सुखा पावावे

देवेंद्राच्या कृपादृष्टीने धन्य कृतार्थ व्हावे ||५||

तमित्स॑खि॒त्व ई॑महे॒ तं रा॒ये तं सु॒वीर्ये॑ ।

स श॒क्र उ॒त नः॑ शक॒दिन्द्रो॒ वसु॒ दय॑मानः ॥ ६ ॥

मनी कामना इंद्रप्रीतिची वैभव संपत्तीची

करित प्रार्थना शौर्यप्राप्तीचा आशीर्वच देण्याची 

आंस लागली देवेंद्राच्या पावन चरणद्वयाची

प्रदान करी रे शक्ती आम्हा अगाध कर्तृत्वाची ||६||

सु॒वि॒वृतं॑ सुनि॒रज॒मिन्द्र॒ त्वादा॑त॒मिद्यशः॑ ।

गवा॒मप॑ व्र॒जं वृ॑धि कृणु॒ष्व राधो॑ अद्रिवः ॥ ७ ॥

तुझ्या कृपेने प्राप्त जाहली कीर्ती दिगंत होई

लहरत लहरत पवनावरुनी सर्वश्रुत ती होई

हे देवेंद्रा प्रसन्न होऊनी धेनु मुक्त करी 

प्रसाद देऊनि आम्हावरती कृपादृष्टीला धरी ||७||  

न॒हि त्वा॒ रोद॑सी उ॒भे ऋ॑घा॒यमा॑ण॒मिन्व॑तः ।

जेषः॒ स्वर्वतीर॒पः सं गा अ॒स्मभ्यं॑ धूनुहि ॥ ८ ॥

तुमच्या कोपा शांतवावया कधी धजे ना कोणी

भूलोकी वा द्युलोकीही असा दिसे ना कोणी

स्वर्गोदकावरी प्रस्थापुन सार्वभौम स्वामित्व

सुपूर्द करुनी गोधन अमुचे राखी अमुचे स्वत्व ||८||

आश्रु॑त्कर्ण श्रु॒धी हवं॒ नू चि॑द्दधिष्व मे॒ गिरः॑ ।

इन्द्र॒ स्तोम॑मि॒मम् मम॑ कृ॒ष्वा यु॒जश्चि॒दन्त॑रम् ॥ ९ ॥

श्रवण तुम्हाला समस्त सृष्टी ऐकावी प्रार्थना 

प्रसन्न व्हावे स्वीकारुनिया माझ्या या स्तोत्रांना 

तुम्हीच माझे सखा मित्र हो माझ्या हृदयाशी

जतन करावे या स्तवनाला घ्या अंतःकरणाशी ||९||

वि॒द्मा हि त्वा॒ वृष॑न्तमं॒ वाजे॑षु हवन॒श्रुत॑म् ।

वृष॑न्तमस्य हूमह ऊ॒तिं स॑हस्र॒सात॑माम् ॥ १० ॥

सर्वश्रेष्ठ तू अशी देवता ज्ञान अम्हापाशी

ऐकुनिया भक्तांची प्रार्थना सहजी प्रसन्न होशी

वरुणाचा तर तूच अधिपति तुझी प्रीति व्हावी

सहस्रावधी श्रेष्ठ कृपा तव अम्हावरती व्हावी ||१०||

आ तू न॑ इन्द्र कौशिक मन्दसा॒नः सु॒तं पि॑ब ।

नव्य॒मायुः॒ प्र सू ति॑र कृ॒धी स॑हस्र॒सामृषि॑म् ॥ ११ ॥

सोमरसाला स्वीकारुनिया सत्वर होई प्रसन्न

इंद्र कौशिका दीर्घायुष्य आम्हा देई दान 

सर्वांहुनिया सहस्रगुणांनी श्रेष्ठ ऐसे ऋषित्व

वर्षुनिया आम्हावरती द्यावे आम्हासि ममत्व ||११||

परि॑त्वा गिर्वणो॒ गिर॑ इ॒मा भ॑वन्तु वि॒श्वतः॑ ।

वृ॒द्धायु॒मनु॒ वृद्ध॑यो॒ जुष्टा॑ भवन्तु॒ जुष्ट॑यः ॥ १२ ॥

वैखरीतुनी सिद्ध स्तोत्र ही तुझेच स्तवन करो

स्वीकारास्तव मम स्तवने ही पात्र श्रेष्ठ ठरो 

करी सुयोग्य सन्मान तयांचा सर्वस्तुत देवा 

अनंत तव आयुसम त्यांना चिरंजीव वर द्यावा  ||१२|| 

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

९८९०११७७५४

nishikants@gmail.com

https://youtu.be/VvefU67uon4

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘Admiral’ कान्होजी राजे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘Admiral’ कान्होजी राजे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

काल, ट्विटर वर कोणीतरी पोस्ट केलं होतं की सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे नाव गुगल सर्च केल्यावर ‘Pirate’ म्हणजे ‘ समुद्री डाकू ‘ म्हणून येत आहे. याची शहानिशा करून घ्यावी म्हणून मी सुद्धा सर्च केलं आणि खरंच गुगल वर दुर्दैवाने सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या नावाच्या description खाली pirate लिहिलेले होते.

मुळात, या गोष्टीवर आक्षेप का घ्यावा, याचं संक्षिप्त रुपात उत्तर देतो. ज्या वेळेला पोर्तुगीज, ब्रिटीश, डच आणि इतर काही परकीय हल्लेखोर भारताच्या समुद्र किनाऱ्यावर असलेल्या ठिकाणांवर हल्ला करीत होते, लुटत होते, तेव्हा कान्होजी राजांनी त्यांना चांगला ‘सडकवून’ काढला होता. 

कान्होजी राजांच्या भयामुळे अनेक हल्लेखोर त्यांच्या भागात यायचा विचार सुद्धा करत नव्हते ! कान्होजींच्या शौर्याच्या कथा खूप आहेत. कालांतराने, १९५१ साली मराठा नौदलाचे ‘Admiral’ कान्होजी राजे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘INS ANGRE’ या नावाने एका ‘Stone Frigate’ ला नाव देण्यात आले.

कान्होजी राजांचे योगदान अतुलनीय आहे ! पण दुर्भाग्य बघा, इतक्या शूर वीर नौका-नायकाला ‘Pirate’ म्हणून संबोधले गेले आहे ! ही गोष्ट वेळीच सुधारणे गरजेचे आहे. याकरिता आपण एक काम करू शकतो.

  1. गुगल वर जाऊन ‘कान्होजी आंग्रे’ सर्च करा !
  2. नावापुढे दिसणारे तीन डॉटवर क्लीक करून ‘send feedback’ वर क्लिक करा ! आणि ‘Pirate’ या शब्दाच्या बाजूच्या एडिट बटणावर क्लिक करा.
  3. नवीन Window Open झाल्यावर तिथे ‘Inappropriate’ किंवा ‘Incorrect’ वर क्लिक करून ‘फीडबॅक’ मध्ये ‘Maratha Navy Admiral’ असे लिहून सेंड करा !

जास्ती जास्त संख्येने ही गोष्ट करा ! आणि लोकांना देखील असे करण्यासाठी आव्हान करा ! कारण हा इतिहास लोकांना माहित असायलाच हवा. सन्मान क्वचित होतो, पण बदनामी मात्र सहज केली जाते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. 

लेखक : अज्ञात

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एक वादळ —-जमादार बापू लक्ष्मण लामखडे ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

? इंद्रधनुष्य ?

☆ एक वादळ —-जमादार बापू लक्ष्मण लामखडे ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆ 

नुकतंच मी एका वादळाविषयी वाचलंय…

अनेक हिंदी चित्रपटांतून देशातील, विशेषतः विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेल्या मुंबईतील अंडरवर्ल्ड जगतातील अनेक पैलू दाखवले जातात. अनेक स्मगलर्स ,गॅन्गस्टर्स – त्यांच्या कामाच्या पध्दती, डावपेच दाखवून कुणीतरी हिरो किंवा प्रामाणिक पोलीस ऑफिसर ते कसे उधळून लावतो हे दाखवले जाते.अर्थात यात रंजकतेचा भाग मोठा असतो. यातील कथानक काल्पनिक असते. असे चित्रपट लोकप्रिय झाले. पण मुंबईतील गँगस्टर्स,स्मगलर्स यांना सळो की पळो करून सोडणारा एक खंदा वीर आपल्या देशात होऊन गेला,आणि त्याने एकेकाळी दैदिप्यमान इतिहास निर्माण केला होता. हा वीर आणि त्याने घडवलेला इतिहास आज कुणाला फारसा माहीत नाही.

२०२२ हे या वीराचे जन्मशताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने व्हाट्सअप वर एक पोस्ट वाचली आणि त्यातून या  कर्तृत्वाची माहिती झाली, आणि माझ्या शब्दात ती सर्वांपर्यंत पोहोचवावीशी वाटते आहे.  

प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशा या वीराचे नाव आहे- जमादार बापू लक्ष्मण लामखडे. २ जुलै १९२२  रोजी जुन्नर तालुक्यातील (जि.पुणे) मंगरूळ पारगाव इथं एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. प्लेगच्या साथीत  वडिलांचे निधन झाले होते. मोठा भाऊ मुंबईतील गोदीत कामाला होता. गावी आपल्या आईची करडी शिस्त, आणि रानात शेळया चारताना आजूबाजूच्या निसर्ग यांच्या सान्निध्यात बापू लहानाचा मोठा झाला. त्याची शरीरयष्टी मजबूत बनली. पुढे त्याने चरितार्थासाठी मुंबईच्या गोदीत कामाला सुरुवात केली. 

१९४४ मध्ये मुंबई कस्टममध्ये शिपाई म्हणून तो रूजू झाला. कसलेले शरीर, धाडसी स्वभाव, तीक्ष्ण नजर या जोरावर बापूने कस्टममध्ये अजोड काम केले. १९६०-७० हे दशक हा मुंबई अंडरवर्ल्डचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. या काळात अनेक स्मगलर्स आणि गॅन्गस्टर्सनी देशात धुमाकूळ घातला होता. सामाजिक अशांतता आणि अस्थैर्याचे वातावरण निर्माण केले होते. दारू,मटका, स्मगलिंग, यामधून देशाला वेठीस धरले होते.अशा अनेकांवर बापूंनी वचक बसवला होता. अनेक तस्करांना पकडून त्यांच्याकडून त्यांनी त्यावेळी लाखो रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. आपले असेच कर्तृत्ववान, धाडसी सहकारी आणि वरिष्ठांच्या सहाय्याने बापूंनी त्याकाळी अनेक गुन्हेगारांवर वचक बसवला होता. त्यांच्या कर्तृत्वाच्या आणि धाडसी यशाच्या अनेक कहाण्या मुंबई कस्टमच्या इतिहासात नोंदल्या गेल्या आहेत.

बापूंना पुढे जमादार पदावर बढती देण्यात आली. त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल  १९६४ मध्ये त्यांना राष्ट्रपतीपदाने गौरविण्यात आले. बापू लामखडे यांचे जीवनकार्य हा देशप्रेमाचा धगधगता आविष्कार होता. सततची जागरणं आणि  धावपळीचा परिणाम बापूंच्या शारीरिक स्थितीवर होऊन ते आजारी पडले आणि त्यांचे निधन झाले. ‘ बापूंनी आपल्या धाडसाने मुंबई कस्टमच्या इतिहासात एका कर्तृत्ववान पाठ कायमचा लिहून ठेवला आहे,’ असा उल्लेख मुंबई कस्टमने केला. त्यांना दुसर्‍यांदा मरणोत्तर राष्ट्रपती पदक बहाल करण्यात आले. मुंबईतील कस्टम ऑफिसच्या चौकाला, ” जमादार लक्ष्मण बापू चौक ”  असे नाव देण्यात आले. तसेच त्यांच्या जन्मगावी त्यांचा ब्राॅन्झचा पुतळा उभारण्यात आला आहे.

जमादार बापू लक्ष्मण लामखडे यांचे जीवनकार्य हे साऱ्या भारतीयांसाठी देशाभिमानाचे जाज्वल्य प्रेरणास्रोत आहे.

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ.

ईमेल- sks.satish@gmail.com

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆☆ ||लंकायां शांकरी देवी||… श्री सुजीत भोगले ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ ||लंकायां शांकरी देवी|| श्री सुजीत भोगले ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे☆

सध्या मार्गशीर्ष मास चालू आहे. मार्गशीर्षातील गुरुवारी लक्ष्मीची शक्तीची उपासना अत्यंत फलदायी असते हे आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे. आज मातेच्या कृपेने एका दुर्मिळ देवस्थानाची आणि एका अज्ञात स्तोत्राची माहिती देण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आज एका वेगळ्या आणि आपल्याला अपरिचित देवीबद्दल माहिती देतोय. 

अष्टदशा शक्तीपीठातील प्रथम पीठ “ लंकायां शांकरी देवी.  रावणाच्या लंकेची ग्रामदेवता. जागृत शक्तीपीठ लंकेतील शांकरी देवी. यास्थानी देवी सतीच्या मांडीच्या अस्थी कोसळल्या होत्या अशी वदंता आहे. अर्थात हे एक्कावन शक्तीपीठांच्यापैकी एक पीठ आहे. 

आदि शंकराचार्य विरचित अष्टदशा शक्तीपीठ स्तोत्र आहे. यातील प्रथम नाम लंकायां शांकरी देवीचे आहे. ही देवी अष्टभुजा आहे. या देवीचे दर्शन आचार्यांनी घेतले आहे. या देवीचे मंदिर श्रीलंकेत त्रिंकोमाली शहरात आहे. इथेसुद्धा मूल स्थान पोर्तुगीजांनी उध्वस्त केले. आता जीर्णोद्धार केला आहे. ही देवी म्हणजे अन्य कोणी नसून अष्टभुजा भवानी माता आहे. 

या पोस्टसह जोडलेले स्केच कोणेश्वरम, त्रिंकोमाली इथल्या मूर्तीचे आहे. तिथे तिला मथुमाई अम्मम म्हणतात आणि तिचे स्वरूप हे आपल्या श्री ललिता सहस्त्रानामाच्या दृष्टीने मनोन्मयी देवीचे आहे. या नामाचे विवेचन माझ्या ‘ श्री ललिता सहस्त्रनाम भावार्थ निरुपण ‘ या ग्रंथात केले आहे.   

ज्या शांकरी देवीची उपासना रावणाने आणि आदि शंकराचार्यांनी केली ते देवीचे रूप आणि हे रूप यात भिन्नत्व आहे. परंतु तिचाच अंश म्हणून आज या देवीची उपासना केली जाते. 

देवीच्या अष्टभुजा रुपात तिच्या हातातील शस्त्रे म्हणजे चक्र , दंड, गदा, खड्ग, अक्षमाला, धनुष्य, त्रिशूल आणि अभय मुद्रा.. 

माझा अंदाज चूक नसेल तर आपल्या तुळजाभवानीची मूळ मूर्ती सुद्धा अशीच असणार. 

शांकरी देवीचा ध्यानाचा श्लोक देतोय… खूप सुलभ आणि अर्थपूर्ण आहे.  

रावणस्तुतिसंतुष्टा कृतलंकाधिवासिनी ।

सीताहरणदोषेण त्यक्तलंकामहेश्वरी ।।

सज्जनस्तुतिसंतुष्टा कदंबवनवासिनी ।

लंकायाम् शांकरी देवी रक्षेत्धर्मपरायणा ।।

अर्थ : रावणाच्या स्तुतीने संतुष्ट झालेली लंकेची ग्रामदेवता, जिच्या उपासनेने रावणाच्या सीताहरण दोषाचे निराकरण झाले. जी सज्जनांच्या स्तुतीने प्रसन्न होते. जी कदंबवनात निवास करते. अश्या लंकेच्या शांकरी देवीला मी नमन करतो. तिने मला धर्मरक्षणाची प्रेरणा प्रदान करावी आणि मला धर्मपरायण वृत्तीला अंगी धारण करण्याचे सामर्थ्य प्रदान करावे. 

आदि शंकराचार्य विरचित  

|| अष्टादश शक्तिपीठ स्तोत्रम् ||

लंकायां शांकरीदेवी कामाक्षी कांचिकापुरे ।

प्रद्युम्ने शृंखलादेवी चामुंडी क्रौंचपट्टणे ॥ १ ॥

 

अलंपुरे जोगुलांबा श्रीशैले भ्रमरांबिका ।

कॊल्हापुरे महालक्ष्मी मुहुर्ये एकवीरा ॥ २ ॥

 

उज्जयिन्यां महाकाली पीठिकायां पुरुहूतिका ।

ओढ्यायां गिरिजादेवी माणिक्या दक्षवाटिके ॥ ३ ॥

 

हरिक्षेत्रे कामरूपी प्रयागे माधवेश्वरी ।

ज्वालायां वैष्णवीदेवी गया मांगल्यगौरिका ॥ ४ ॥

 

वारणाश्यां विशालाक्षी काश्मीरेतु सरस्वती ।

अष्टादश सुपीठानि योगिनामपि दुर्लभम् ॥ ५ ॥

 

सायंकाले पठेन्नित्यं सर्वशत्रुविनाशनम् ।

सर्वरोगहरं दिव्यं सर्वसंपत्करं शुभम् ॥ ६ ॥

इति अष्टादशशक्तिपीठस्तुतिः ।

लेखक : – श्री सुजीत भोगले

संग्राहक : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मेरा देश सहीमे बदल रहा है… लेखक – श्री हेमंत केळकर ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?इंद्रधनुष्य?

 ☆ मेरा देश सहीमे बदल रहा है… लेखक – श्री हेमंत केळकर ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆ 

आज भुसावळ ते गोवा जातांना रेल्वे मध्ये आलेला सुखद अनुभव..

अचानक मित्राच्या 2 वर्षाच्या मुलाला ताप आला.. जवळ कसल्याही औषधी नाहीत.. डेस्टिनेशन मडगाव पोहचायला 7 तास अवधी.. विचार आला पुढच्या स्टेशन ला उतरू आणि एकदा डॉक्टरला दाखवू मग पुढचा प्रवास बाय रोड करू.. सहज म्हणून ट्रेन मध्ये सामान विकणाऱ्याला म्हटलं आम्हाला काही औषधी हव्या आहेत.. पुढच्या स्टेशन ला व्यवस्था करून दे, तुला खर्च पाण्याला 500 रुपये देतो.. तो विक्रेता म्हणाला काही गरज नाही TC ला भेटा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल.. TC ला लगेच भेटलो.. सरकारी नोकरांची तत्परता उभ्या आयुष्यात मी इतकी कधीच अनुभवली नव्हती.. हातातलं काम सोडून त्याने समोर फोन लावला.. आमचा सीट नंबर आणि मेडिकल कंडिशन नोट केल्यात आणि आम्हाला सीट वर जायला सांगितलं… समाधानाची अपेक्षा नव्हती.. पुढच्या स्टेशन वर उतरून माझ्या मित्राच्या मुलाला दवाखान्यात दाखवून बाय रोड च आम्ही प्लॅन केलाच होता.. आम्हाला वाटल एखादा मुलगा येईल पेपर मध्ये गुंडाळून गोळ्या देईल..पण पुढच्या स्टेशन ला अक्षरशहा डॉक्टर त्यांचा असिस्टंट सोबत आमच्या सीट वर हजर.. सोबत TC सुद्धा होते.. तपासल्या नंतर लगेच त्यांनी Assistant ला आम्हाला काही सिरप च्या बॉटल द्यायला लावल्या.. कसं घ्यायचं हे सांगून लगेच TC ला सांगितलं कि ह्यांना पॅन्ट्री मधून मीठ पाठवा.. TC ने लगेच फोन लावला.. मिठाच्या पाण्याच्या पट्टी कपाळावर फिरवायला सांगितलं आणि निघून गेले.. आम्ही आवाज देऊन किती पैसे झाले म्हणून विचारलं तर हे सगळं विनामूल्य होतं..आश्चर्य च्या धक्क्यातच सीट वर पोहचलो तोपर्यंत पॅन्ट्री  वाला मीठ घेऊन हजर..

मेरा देश सहीमे बदल रहा है..

काय करायचं राव — त्या पेट्रोलला काय पिऊन घ्यायचं का…… 

अशी होत असलेले  सुधारणा हे मिडीया / पेपर वाले दाखवत नाही. बदल होत आहे.आपणसुद्धा आपल्या नातेवाईकांना व मित्रमंडळींना कळवावे. वेळ लागेल, पण आपण झालेला व होत असलेला बदल अनुभवत आहोत.

लेखक :  हेमंत केळकर

संग्राहक : माधव केळकर. 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आठवणीतील सांस्कृतिक पुणे… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ आठवणीतील सांस्कृतिक पुणेलेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुमारे ३५-४० वर्षांपूर्वी, किंबहुना त्यापेक्षाही अगोदरपासूनच्या कालखंडात पुणे हे एक छोटेखानी पण टुमदार, आटोपशीर गाव होतं…” पुणे शहर ” झालेलं नव्हतं….

सदाशिव, शनिवार, नारायण, शुक्रवार वगैरे पेठांमध्ये वाडे एकमेकांना चिकटून, जणू एकमेकांच्या हातात हात घालून उभे होते. चोर-पोलीस खेळतांना सहज एका वाड्यातून दुसऱ्या वाड्यात जाता येत असे. किंबहुना शेजारच्यांच्या घरात घुसून बिनदिक्कत कॉटखाली वगैरे लपता येत असे. लाकडी जिन्यातून कुणी भरभर खाली उतरलं की अक्षरशः ढगांच्या गडगडाटाचा आवाज येत असे. चौकात संध्याकाळी डबडा ऐसपैसचा नाहीतर इस्टॉपाल्टीचा डाव रंगत असे. फार दमायला झालं, किंवा धो धो पाऊस पडला, तर कुठे तरी वाड्यात वळचणीला बसून गाण्यांच्या भेंड्या रंगत असत. मग एक तरी सुरेल गाणारी तिखट चिमुरडी “आ जा सनम मधुर चांदनीमें हम….” हे गाणं म्हणतच असे. 

किंवा देशांच्या राजधान्या ओळखणे, चेरापुंजी कशासाठी प्रसिद्ध आहे?? वगैरे “जनरल नॉलेज” च्या गप्पा होत होत,

” तुला माहितीये का ?? पाकिस्तानकडे शंभर ऍटम बॉम्ब आहेत…”  किंवा ” माझे बाबा एकदा अमावास्येला शनिवारवाड्याच्या जवळून रात्री येत होते, तेव्हा त्यांनी ‘ काका मला वाचवा….’ असा आवाज ऐकला होता ” 

अशा स्वरूपाच्या दंतकथा रंगत. एखादा शी – शू विहार मधला गडी मग तिथेच रडू लागे. आणि मग 

” ए … कशाला रडवता रे त्याला?? ” असा सज्जड दम एखादी आई देई.

शाळांच्या पटांगणात रात्री ” गीत रामायण,” “ जाणता राजा ” यासारख्या कार्यक्रमांची रेलचेल आणि मेजवानी असे. मग रात्री भारावलेल्या वातावरणात शांत झोपी गेलेले वाडे बघत बघत घरी पायी, नाही तर सायकलवर वाटचाल करायची. क्वचित थंडीत स्वेटर, शाल, चादर पांघरून कुडकुडत घरी जायचं….. गोदरेजचं कुलूप उघडून जाड लोखंडी साखळी असलेला दरवाजा उघडायचा….. काळ्या बटनावर लागणारा पिवळा साठचा बल्ब लावायचा…. कुणाकडे हातात सेलची बॅटरीही असायची…. 

पुण्याचं तेव्हाचं सांस्कृतिक केंद्र म्हणजे ” भरत नाट्य मंदिर “…. मध्यंतरात भजी खायची… चहा प्यायचा…. आणि अंधारात चाचपडत येऊन आपली सीट पकडायची….

भरत नाट्य बाहेर मधू आपटे हे ज्येष्ठ अभिनेते खुर्ची टाकून बसलेले असायचे…..

कुणी नाटकानंतरही “गुडलक” “पॅराडाईज” “रीगल” वगैरे इराणी हॉटेलात तळ देत…. किंवा वाड्याच्या दारातच मध्यरात्रीपर्यंत कुडकुडत गप्पा छाटायच्या……

तेव्हाचं पुणं मध्यमवर्गीय, साधं…..पेरूगेट, नु.म.वि., अहिल्यादेवी, विमलाबाई गरवारे, हुजूरपागा या संस्कारकेंद्रांभोवती विणलेलं….. “स्वामी”… “छावा”…. “नाझी भस्मासुराचा उदयास्त”…… इत्यादि साहित्यविश्वात रमणारं होतं…… भीमसेन जोशींना अगदी समोर बसून ऐकता येत होतं किंवा भेटता येत होतं…..

ना. ग. गोरे… एस. एम. जोशी अशी थोर नेतृत्वं होती…

खरोखरच तेव्हाचं पुणं हे त्यावेळच्या पहाटेच्या सुंदर धुक्यासारखं एक गोड सांस्कृतिक स्वप्न होतं…..

सुंदर स्वप्नातून जागं झाल्यावरही त्या स्वप्नाची आठवण दिवसभर मनात रेंगाळत रहावी, तसं हे तेव्हाचं सुंदर पुणं मनात सदैव रेंगाळत राहतं……….!!!

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “साठीमधला म्हातारा …” – अनामिक ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? इंद्रधनुष्य ? 

☆ “साठीमधला म्हातारा …” – अनामिक ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

खूप टिकाऊ मासा जसा – चवीला नेहमीच खारट असतो,

तसाच…. साठीमधला म्हातारा थोडा जास्तच चावट असतो !

 

उजेडाचा त्रास होतो म्हणून गॅागल वापरत असतो,

काळ्याभोर काचेमागून ” निसर्गसौंदर्य ” न्याहाळीत असतो !

शेजारीण आली घरी की आनंदाने हसत असतो,

बायकोला चहा करायला लावून स्वत: गप्पा मारत बसतो—

कारण…. साठीमधला म्हातारा थोडा जास्तच चावट असतो !

 

पाय सतत दुखतात म्हणत घरच्या घरी थांबत असतो,

बाकी सगळ्या दिवशी मात्र मित्रांबरोबर भटकत असतो !

चार घास कमीच खातो असं घरात सांगत रहातो

भजी समोसे मिसळपाव बाहेर खुशाल चापत असतो

कारण …. साठीमधला म्हातारा थोडा जास्तच चावट असतो !

 

औषधाचा डोस गिळतांना घशामध्ये अडकत असतो,

पार्टीत चकणा खाता खाता चार चार पेग रिचवत असतो

अध्यात्माच्या गप्पा मोठ्या चारचौघात झोडत असतो

मैत्रिणींच्या घोळक्यात मात्र रंगेल काव्य ऐकवत असतो

कारण ….. साठीमधला म्हातारा थोडा जास्तच चावट असतो !

 

साठीमधला म्हातारा आता निवृत्तीत गेलेला असतो

विरंगुळ्याला जुन्या जुन्या आठवणीत रमत असतो

काम नसतं हातामध्ये, किंमत नसते घरामध्ये ! …. 

म्हटलं तर ज्येष्ठ असतो, तरी बराच तरूण असतो

संपून गेलेलं तारुण्य पुन्हा आणू पहात असतो

 

कारण ….. खूप टिकाऊ मासा जसा चवीला नेहेमीच खारट असतो

तसाच ….. साठीमधला म्हातारा थोडा जास्तच चावट असतो !

 

रचना – अनामिक

संग्राहक – श्री विनय माधव गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares