ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ३० जुलै – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे– ई – अभिव्यक्ती (मराठी)
श्रीकृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर
( ३१ ऑक्टोबर १९२६ —- ३० जुलै २०१३ )
श्रीकृष्ण अर्जुनवाडकर हे संस्कृतचे आणि मराठी व्याकरणाचे व्यासंगी अध्यापक, अभ्यासक आणि संशोधक होते. त्यांनी वेदांत, योग, तत्वज्ञान, संस्कृत साहित्यशास्त्र, मराठी व्याकरण इ. विषयांवर, इंग्रजी, मराठी आणि संस्कृत भाषेत ग्रंथस्वरूप व स्फुटलेखन स्वरूपात विपुल लेखन केले आहे. त्यांनी आपले वडील अण्णाशास्त्री यांच्याकडे पारंपारिक पद्धतीने संस्कृतचे अध्ययन केले. त्यानंतर विष्णुशास्त्री बापट यांनी सुरू केलेल्या ‘आचार्य कुला’त तीन वर्षे राहून शांकर वेदांताचा अभ्यास केला. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी ‘वेदान्त – कोविद’ ही बी. ए. च्या समकक्ष पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी नेहमीचे औपचारिक शिक्षण घेतले. १९४६ मध्ये ते मॅट्रिक झाले. त्यांना जगन्नाथ शंकर शेठ शिष्यवृत्ती मिळाली. पुढे त्यांनी बी.ए. व एम.ए या पदव्या मिळवल्या.
त्यांनी पुण्यातील नू.म.विद्यालय , नवरोसजी वाडिया, स.प. महाविद्यालय, कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ इ. ठिकाणी संस्कृत, अर्धमागधी आणि मराठीचे अध्यापन केले. मुंबईच्या एशियाटिक सोसायटीपासून केंब्रीज विद्यापीठापर्यंत अनेक ठिकाणी संस्कृत, योग, वेदान्त, उपनिषदे, भगवद्गीता, रससिद्धांत इ. वर व्याख्याने दिली.
श्रीकृष्ण अर्जुनवाडकर यांचे प्रकाशित साहित्य –
१. सुबोध भारती – अरविंद मंगरूळकर आणि केशव जिवाजी दीक्षित यांच्या मदतीने इ. ८वी, ९वी, १०वी साठी पाठ्यपुस्तके तयार केली.
२. अर्धमागधी शालांत दीपिका
३. मराठी: घटना, रचना, परंपरा यावरील पुस्तके अरविन्द मंगरूळकर यांच्या सहयोगाने तयार केली.
४. प्रीत गौरी गिरीशम् – ही संगीतिका कालिदासाच्या ५व्या सर्गाच्या कथानकावर आधारलेली आहे. संस्कृतमधे दुर्मीळ असा अन्त्य यमकाचा यात विपुल वापर आहे. यात गेयता आहे. या संगीतिकेचा प्रयोग १९६० मधे वाडिया कॉलेज इथे झाला.
५. संस्कृत भाषा आणि साहित्य- महादेवशास्त्री जोशी यांनी संपादित केलेल्या भारतीय सांस्कृतिक कोशाच्या ९व्या खंडात त्यांनी या विषयाचा विस्तृत निबंध लिहिला आहे.
६. शास्त्रीय मराठी व्याकरण
७. ग-म-भ-न या ललित मासिकात ‘पंतोजी’ या नावाने मराठी शुद्धलेखनाच्या संदर्भात अनेक प्रश्नांचा ऊहापोह करणारी ३१ लेखांची लेखमाला लिहिली
८. मराठी व्याकरण वाद आणि प्रवाद
९. मराठी व्याकरणाचा इतिहास
१०. विविध नियतकालिकातून वेळोवेळी त्यांचे ३००च्या वर लेख प्रकाशित झाले आहेत.
११. संस्कृत भाषा आधुनिक जीवनाच्या अधिक जवळ नेण्याच्या दृष्टीने, त्यांनी इंग्रजीतील आधुनिक पद्धतीची अभिवादने सोप्या, समर्पक संस्कृतातून उपलब्ध करून दिली आहेत. उदा. गुडमॉर्निंग- सुप्रभातम्, गुड डे – सुदिनम् , गुड बाय – स्वस्ती , विश यू बेस्ट लक – सुभाग्यमस्तु इ.
श्री. श्रीकृष्ण अर्जुनवाडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
☆☆☆☆☆
सुधाकर प्रभू (निधन ३० जुलै २००७ )
सुधाकर प्रभू यांचा बालकुमार साहित्यिक म्हणून लौकिक आहे. त्यांचा जन्म गोव्यातील पेडणे या गावी झाला. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी मुंबईत घेतले. पदवी मिळवल्यावर त्यांनी अध्यापनाचा व्यवसाय सुरू केला. पुण्यातील हिंद हायस्कूलचे ते मुख्याध्यापक होते.
वयाच्या १८व्या वर्षीपासून त्यांच्या कथा ‘आनंद’ आणि ‘बालमित्र’ या मुलांच्या मासिकामधून प्रसिद्ध होऊ लागल्या. याखेरीज ‘सा. स्वराज्य, रविवार सकाळ, सा.हिंदू, साधना यासारख्या नियतकालिकातून देखील त्यांनी लेखन केले. त्यांची २००च्यावर पुस्तके आहेत. त्यांची राजू प्रधान ही व्यक्तिरेखा, भा. रा. भागवत यांच्या फास्टर फेणे याच्याप्रमाणेच लोकप्रिय झाली.
सुधाकर प्रभू यांची काही निवडक पुस्तके–
१. मी सातववाडीचा लहान्या, २. लग्नघरात राजू प्रधान, ३. एका रात्रीची गंमत, ४. कोणार्कचे कलाकार, ५. प्राणी स्वतंत्र झाले, ६. अशी जिंकली खिंड हाजीपीर, ७. धिटुकली, ८. हिरवी हिरवी गार, ९. चला झाडे लावू चार, १० अमोल अमोल
बालसाहित्यातील त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना गोवा कला अकादमी, गोवा सरकार, भारत सरकारचे पुरस्कार लाभले आहेत. कोल्हापूरमधे १९९१ साली झालेल्या बाल कुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
श्री. सुधाकर प्रभू यांना त्यांच्या आजच्या स्मृतीदिनी विनम्र श्रद्धांजली.
☆☆☆☆☆
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ २९ जुलै – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
निर्मलकुमार फडकुले
निर्मलकुमार फडकुले हे मराठीतील संत साहित्याचे गाढे अभ्यासक, ललित लेखक व आस्वादक समीक्षक होते. सोलापूर येथे जन्मलेल्या फडकुले यांनी ‘लोकहितवादी: काल आणि कर्तृत्व’ हा प्रबंध सादर करून डाॅक्टरेट प्राप्त केली. लेखनाबरोबरच ते एक उत्तम वक्तेही होते.
त्यांनी काही काळ नांदेड येथे प्राध्यापक म्हणून काम केले. नंतर सोलापूर येथील संगमेश्वर महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी स्विकारली व तेथूनच निवृत्त झाले.
फडकुले यांची साहित्य संपदा:
अमृतकण कोवळे,आनंदाची डहाळी,काही रंग काही रेषा,चिंतनाच्या वाटा,परिवर्तनाची चळवळ,मन पाखरू पाखरू,संतकवी तुकाराम -एक चिंतन,संत वीणेचा झंकार इत्यादी.
संपादित साहित्य :
अमृतधारा, चिपळूणकरांचे तीन निबंध, आदित्य आणि शुभंकर नियतकालिके, प्रबोधनातील पाऊलखूणा, रत्नकरंड श्रावकाचार, ज्ञानेश्वरी प्रथमाध्याय.
फडकुले यांनी आपल्या व्याख्यानांतून डाॅ.आंबेडकर,म.फुले,स्वा. सावरकर, ना.सि.फडके, प्र.के.अत्रे इत्यादी व्यक्तिंचे कार्य ओघवत्या भाषेत विषद केले आहे.
सोलापूर येथील भैरूरतन दामाणी पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. 1986मध्ये नाशिक येथे झालेल्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते .
वयाच्या 78 व्या वर्षी 29/7/2006 ला त्यांचे निधन झाले.
☆☆☆☆☆
सखाराम हरी देशपांडे
शिरवळ येथे जन्मलेल्या स.ह.देशपांडे यांनी सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून बी.ए.पूर्ण केले.नंतर मुंबई विद्यापीठात अर्थशास्त्रात एम्.ए. व डाॅक्टरेट संपादन केली.
राष्ट्रवाद आणि हिंदुत्व हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता.त्याचबरोबर कृषी अर्थशास्त्र या विषयांत त्यानी अध्यापन व लेखन केले आहे.
भारतीय एकात्मता केंद्र, ज्ञानप्रबोधिनी पुणे या संस्थेचे ते काही काळ प्रमुख होते. ग्रामायन, पुणे चे ते संस्थापक सदस्य होते. सातव्या मराठी अर्थशास्त्र परिषदेचे ते अध्यक्ष होते. लेखनाबरोबरच त्यांनी आदिवासी आणि दलित समाजात सहकारी शेती चे उपक्रम राबविले.
स.ह.देशपांडे यांचे साहित्य:
अमृतसिद्धी भाग 1 व 2
आर्थिक प्रगतीचे रहस्य:भारतीय शेती
आर्थिक विकासाच्या पाय-या
काही आर्थिक,काही सामाजिक
किबुटझ:नवसमाज निर्मितीचा एक प्रयोग
दुभंग,
भारताचा राष्ट्रवाद
हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व
हिंदुत्वाची फेरमांडणी इत्यादी.
29/07/2010 रोजी वयाच्या 86 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
श्री.निर्मलकुमार फडकुले व स.ह.देशपांडे यांच्या स्मृतीस अभिवादन.
☆☆☆☆☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : विकिपीडिया, मराठीसृष्टी.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २८ जुलै – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर, ई–अभिव्यक्ती (मराठी)
बाबुराव गोखले
बाबुराव गोखले (15 सप्टेंबर 1916 – 28 जुलै 1981) हे ज्येष्ठ नाटककार व गीतकार होते.
बाईंडिंग आणि वृत्तपत्र विक्री हा त्यांचा व्यवसाय.पण त्यांना खाण्याचा, चालण्याचा, पळण्याचा, व्यायामाचा, अघोरी वाटणाऱ्या गोष्टी करण्याचा छंद होता. ते रोज पहाटे साडेतीन ते नऊपर्यंत कात्रज – खेड -शिवापूर – सिंहगड -खडकवासला असे चालत. काही काळ ते पुणे – लोणावळा पायी जात. पुढे दर रविवारी सायकलवरून खोपोलीपर्यंत जात.
पुणे ते कराची सायकलवरून जाऊन त्यांनी जद्दनबाई, हुस्नबानू, बेगमपारोची गाणी मनमुराद ऐकली. ते स्वतः तबला वाजवत. नर्गिसची आई जद्दनबाई यांनी त्यांच्याकडून गंधर्वांची गाणी शिकून घेतली.
बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांच्या मदतीने ते 1936साली बर्लिन ऑलिम्पिकपर्यंत पोहोचले. अनवाणी पायांनी ते 40 मैल पळू शकतात, हे पाहून हिटलरने त्यांना जर्मनीत चार दिवस मुक्त भटकण्यासाठी व हवे ते खाण्यासाठी पास दिला.
बडोद्याच्या महाराजांमुळे ते लंडनलाही गेले. तिथे त्यांच्या स्वागताला 3-4 गव्हर्नर्स गाड्यांसह हजर होते. कारण दर पावसाळ्यात पुण्याला येणाऱ्या गव्हर्नरला ते मराठी – हिंदी भाषा व क्रॉसकन्ट्री शिकवायला जात असत.
हातावर शीर्षासन करत ते पायऱ्या चढत. बायकोला पाठुंगळीस घेऊन त्यांनी 43 वेळा पर्वती सर केली. क्रॉसकंट्री स्पर्धेचे 257 बिल्ले जिंकणाऱ्या गोखलेंना काका हलवाई 1 शेर दूध व 1 शेर पेढ्याचा खुराक देत. पैजेच्या जेवणात ते 90 जिलब्यांचे ताट सहज फस्त करीत. वय झाल्यावरही ते रोज 15 पोळ्या खात.
आपल्या डझनभर नाटकांनी गोखलेंनी प्रेक्षकांना खळखळून हसवले. त्यांची ‘करायला गेलो एक’, ‘रात्र थोडी सोंगे फार’, ‘नाटक झाले जन्माचे’, ‘संसार पाहावा मोडून’ वगैरे नाटके खूपच गाजली. थ्री स्टार्स ही कंपनी स्थापन करून त्यांनी अनेक उत्तम नाटकं दिली. दिग्दर्शक, निर्माता, प्रमुख भूमिका,पार्श्वसंगीत, म्युझिक सेट्स तयार करणे या सगळ्यांत ते अग्रेसर असत.
गोखलेंनी लिहिलेली ‘वारा फोफावला’, ‘ नाखवा वल्हव’ वगैरे गीतेही खूप गाजली.
‘सौभाग्यकांक्षिणी’, ‘साधी माणसं’, ‘राजा गोसावीची गोष्ट’, ‘गंगेत घोडं न्हालं’ इत्यादी चित्रपटांत त्यांचा अभिनेता/ गीतकार /दिग्दर्शक/कथालेखक/ पटकथालेखक वगैरे (यापैकी काही)भूमिकांत सहभाग होता.
बाबुराव गोखले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना सादर अभिवादन.
☆☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया, पोएम कट्टा.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ २७ जुलै -संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर– ई – अभिव्यक्ती (मराठी)
शरद्चंद्र पुराणिक ( इ.स. १९३३९ – २७ जुलै २०१६ )
शरद्चंद्र पुराणिक यांनी संस्कृत विषयात बी.ए., एम. ए. केलं. पुढे इंग्रजी विषय घेऊनही एम. ए. केलं आणि महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. चिपळूण, खेड, अलिबाग इ. ठिकाणी नोकरी करून ते शेवटी चाळीसगावला स्थिरावले. त्यांचे इंग्रजी विषयावर प्रभुत्व होते. इंग्रजी नाटकातील संवाद व स्वागते ते तोंडपाठ म्हणून दाखवत. ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते.
शरद्चंद्र पुराणिक यांना वाचनाची आणि लेखनाचीही प्रचंड आवड होती. त्यांची १६ पुस्तके प्रकाशित झालीत. ८ पुस्तके लिहून तयार आहेत पण ती अद्याप प्रकाशित व्हायची आहेत.
शरद्चंद्र पुराणिक यांची पुस्तके –
इतिहास क्षेत्राशी निगडीत अशी त्यांची बरीच पुस्तके आहेत. उदा. १.पहिला बाजीराव- पूर्वार्ध, उत्तरार्ध, २.मराठ्यांचे स्वातंत्र्य समर- छत्रपती संभाजी, छत्रपती राजाराम , ३. ऋषितर्पण , ४.मराठी इतिहासाच्या अभ्यासकांचे व्यक्तिदर्शन- इ. ८च्या वर त्यांची पुस्तके आहेत. रियासतकार सरदेसाई, राजवाडे, विष्णुशास्त्री , श्री. म. माटे इ. व्यक्ती आणि त्यांचे कार्य सांगणारीही त्यांची पुस्तके आहेत.
पुरस्कार
त्यांच्या ‘रामदास’ या पुस्तकाला पुणे नगर वाचन मंदिरचा तर, ‘तुळाजी आंग्रे’ या पुस्तकाला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा पुरस्कार मिळाला आहे. २०१० साली महाराष्ट साहित्य परिषदेच्या १०४ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्यांना ‘मृत्युंजय’ पुरस्कार देण्यात आला.
शरद्चंद्र पुराणिक यांचा आज स्मृतीदिन. त्यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन.
☆ ☆ ☆ ☆ ☆
सौ. उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २२ जुलै – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे– ई – अभिव्यक्ती (मराठी)
१. सुरेशचंद्र नाडकर्णी यांचा आज स्मृतीदिन. ( इ.स. १९२९ – २२ जुलै २०११ )
सुरेशचंद्र नाडकर्णीहे प्राणीशास्त्राचे प्राध्यापक होते. मराठी लेखक होते. गझलचे अभ्यासक होते आणि संगीततज्ज्ञही होते. तसेच ते आंतरराष्ट्रीय क्रीडासमीक्षकही होते. गझल आणि रुबाई या दोन्ही प्रकारचा त्यांचा मुळापासून अभ्यास होता. मराठी आणि उर्दू दोन्ही भाषेत त्यांनी वरील दोन्ही प्रकारात विपुल काव्यरचना केली आहे. उर्दू काव्यावर त्यांनी पीएच. डी. मिळवली होती. ‘उंबराचे फूल ‘ हा त्यांचा काव्यसंग्रह. तसेच ‘गजल’ हे ‘गजल ‘ काव्यप्रकाराला वाहिलेले पुस्तक त्यांनी लिहिले. सुरेश भट या आपल्या मित्राच्या आग्रहामुळे त्यांनी मराठीत गजला व रुबाया लिहिल्या.
वाडिया कॉलेजमधे ते प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख होते. त्यांनी अध्यापनाबरोबरच अनेक विषयांवर संशोधन व लेखन केले आहे. त्यांची अनेक पुस्तके अभ्यासक्रमात समाविष्ट झालेली आहेत. ‘साप्ताहिक स्वराज्य’मधे ते एके काळी हिन्दी गाण्यांचे रसग्रहण लिहीत असत। क्रीडासमीक्षाही त्यांनी लिहिल्या आहेत. ‘ क्रीडा ज्ञानकोश ’, ‘‘अॅथलॅटिक्समधील सुवर्ण पदकाच्या दिशेने ’ ही त्यांची पुस्तके त्यांच्या क्रीडाक्षेत्रातील नैपुण्याची साक्ष देतात.
सुरेशचंद्र नाडकर्णी यांची पुस्तके –
१. ‘उंबराचे फूल’ (कविता संग्रह),
२. गजल,
३. बहुरंग ( लेखसंग्रह ),
४. सदानंद – सुखी माणसाचा सदरा इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
याशिवाय विज्ञानाशी संबंधितही त्यांची पुस्तके आहेत.
श्री. नाडकर्णी यांना विनम्र आदरांजली.
☆☆☆☆☆
२. मराठी ग्रामीण कवी, बहुढंगी कथालेखक, चतुरस्त्र ग्रामीण कादंबरीकार म्हणून ज्यांचा लौकिकहोता, अशा श्री.गजानन लक्ष्मण ठोकळ यांचा आज स्मृतीदिन.( २६ मे १९०९ – २२ जुलै १९८४ ).
ग.ल. ठोकळ यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील कामरगाव इथे झाला. त्यांचे गाव कायम दुष्काळी व कोरडवाहू शेती असलेले होते. त्यांच्या ग्रामीण कथा – कादंबर्यातून प्रामुख्याने हे वर्णन दिसून येते. त्यातून ग्रामीण माणसे साधी – भोळी, सरळ मनाची, आपुलकी- आत्मीयता जपणारी, आतिथ्यशील अशी दाखवलेली आहेत, तर शहरी माणसे बेरकी असल्याचे दाखवलेले आहे, हे सर्वात आधी सांगावेसे वाटते.
त्यांच्या आईला वाचनाची आवड होती, आणि तिने आणलेली सगळी पुस्तके ते वाचून काढत असत. वयाच्या १६व्या वर्षी त्यांची ‘आकाशगंगा’ ही पहिली कविता प्रसिद्ध झाली. सुरुवातीला काही वर्षे त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. आणि नंतर “ श्री लेखन वाचन भांडार “ हे दुकान सुरू केले, जे वाचकांचे आकर्षण ठरले होते . या जोडीनेच ‘ ४०० हून जास्त मौलिक ग्रंथांचे प्रकाशन करणारे प्रयोगशील प्रकाशक ‘ अशीही ख्याती त्यांनी मिळवली होती.
ते अव्वल दर्जाचे कथालेखक तर होतेच, पण स्वतःची वेगळीच शैली जोपासणारे उत्तम कवीही होते . तेव्हा प्रसिद्ध असणाऱ्या रविकिरण मंडळातील कवींचा त्यांच्यावर जरी प्रभाव होता, तरीही कवी म्हणून त्यांचे स्वतःचे असे एक वैशिष्ट्य होते , आणि ते म्हणजे त्यांच्या कवितेत ठळकपणे दिसणारे ग्रामीण जीवनाचे अस्सल, गहिरे रंग . पण जनमानसात आणि साहित्यविश्वातही “ कथाकार “ हीच त्यांची ठळक ओळख निर्माण झाली होती . कवयित्री शांता शेळके म्हणत की , “ ठोकळ यांनी निर्माण केलेले स्त्री-पुरूषांचे चित्रविचित्र जग हा वास्तव विश्वाचा एक छेद असतो .” वाचकाचे रंजन करतांना त्याला प्रत्यक्ष जीवनातील विविध अनुभवांचा प्रत्यय देणारा समर्थ कथाकार अशी श्री. ठोकळ यांची सार्थ ओळख निर्माण झाली होती .
ग.ल. ठोकळ यांची पुस्तके –
१. कोंदण, २. गावगंड, ३. मत्स्यकन्या, ४. मीठभाकर, ५. कडू साखर, ६. ठोकळ गोष्टी ( याचे अनेक भाग आहेत.) ७. टेंभा, ८. ठिणगी, ९. क्षितिजाच्या पलीकडे, १०. सुगी (निवडक ठोकळ कथा) यापैकी ‘ टेंभा ‘ ही त्यांची आत्मचरित्रवजा कादंबरी आहे .
“ गावगंड “ ही त्यांनी १९४२ च्या क्रांतिपर्वावर लिहिलेली कादंबरी इतकी गाजली की काही विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात तिचा समावेश केला गेला होता.
त्यांच्या जानपदगीतांचा प्रातिनिधिक संग्रहसुद्धा खूप प्रसिद्ध होता, आणि त्याला श्री. वि. स. खांडेकर यांनी प्रस्तावना लिहिली होती.
ग.ल. ठोकळ यांच्यावर ‘ साहित्यश्रेष्ठ ग.ल. ठोकळ ‘ हे पुस्तक लिहिले गेले आहे. अनेक संस्था, साहित्यातील श्रेष्ठ कलाकृतींना ग.ल. ठोकळ यांच्या नावाचा पुरस्कार देतात.
आजच्या ‘ कवितेचा उत्सव ‘ सदरात वाचू या, सर्वांना शाळेच्या आठवणीत घेऊन जाणारी त्यांची एक ग्रामीण बाजाची कविता ..
श्री. ग. ल. ठोकळ यांना मनःपूर्वक श्रद्धांजली.
☆☆☆☆☆
३. मराठवाड्यातील साहित्यिक म्हणून नावाजलेले श्री यशवंत कानिटकर यांचाही आज स्मृतीदिन.(१२/१२/१९२१ – २२/७/२०१५)
लेखक आणि कवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री. कानिटकरांची आणखी एक विशेष ओळख होती ती ‘ भाषातज्ञ ‘ म्हणून . चार भाषांवर त्यांचे प्रभुत्व असल्याने स्वातंत्र्यपूर्व काळातल्या हैदराबाद राज्याच्या भाषा विभागात ‘ भाषांतरकार ‘ म्हणून काम करण्यास त्यांनी सुरुवात केली होती . १९५६ मध्ये झालेल्या ‘ राज्य – पुनर्रचनेनंतर त्यावेळच्या मुंबई राज्यात त्यांची बदली झाली. मुंबईतील सचिवालयात ‘ भाषा संचालक ‘ म्हणून ते रुजू झाले. या भूमिकेतून त्यांनी भाषाविषयक प्रश्नावर , राजभाषा, परिभाषा, अनुवाद, कोशरचना, आदि स्वरूपाचे विपुल लेखन केले. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर, सरकारी कारभाराची भाषा मराठी असेल असे सरकारने जाहीर केले. आणि त्यासाठी ‘ प्रशासनिक परिभाषा कोश ‘ व मार्गदर्शन पुस्तिका तयार करण्याचे काम श्री. कानिटकरांनी केले. भाषासंचालक या भूमिकेतून, राजभाषा मराठीविषयक धोरण राबवणे, परिभाषा कोश, अमराठी कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषेच्या परीक्षांचे आयोजन, केंद्राच्या राज्यासाठी असणाऱ्या अधिनियमांचा अनुवाद , अशी अनेक महत्वाची कामे त्यांनी केली.
पण या सगळ्या शासकीय कामात अतिशय व्यस्त असूनही त्यांचे मराठी साहित्यावरचे प्रेम मात्र तसूभरही कमी झाले नव्हते. साहित्य संस्कृती मंडळ पुरस्कृत मराठी शब्दकोशाचे मुख्य संपादक म्हणून ते काम करत होतेच, पण व्यक्त करण्यासारखे स्वतःचे खास असे खूप काही त्यांच्याजवळ असल्याचे त्यांना सतत जाणवत होते. काव्यकलेवर त्यांची हुकूमत होती, आणि काव्याच्या सामर्थ्याची उचित जाणही होती. त्यामुळेच ‘ मेनका ‘ हा त्यांचा कवितासंग्रह खूप प्रसिद्ध झाला होता. ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांच्या मते ‘ श्री. कानिटकरांच्या कवितांचे छंद, त्यांची भाषा, आकृतिबंध, आणि त्यांची प्रतिमासृष्टी, सगळेच वेगळे होते. त्यांच्या कवितेचे नाते मर्ढेकरांच्या कवितांशी जरी जोडता येत असले, तरी त्या परंपरेतील नवकाव्य त्यांनी हाताळलेले दिसत नाही.’ आयुष्यावरचे उत्कट प्रेम, अर्थपूर्ण जगणे, प्रेम, सृजनता, निसर्गसौंदर्याची अतिशय आवड, हे त्यांच्यातले कविता करण्यासाठी आवश्यक असणारे गुण, तेव्हाच्या हैदराबादमधल्या वातावरणात खूपच खुलले होते. पण मुंबईत आल्यावर माणसांचे तिथले जगणे पाहून, नंतरच्या त्यांच्या कवितांमधून नव्या जाणीव जागृत झाल्याचे स्पष्ट लक्षात येते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही कविता —–
“ कडकलक्ष्मी “ या चित्रपटात ते अभिनेते म्हणूनही रसिकांना दिसले होते.
श्री. गोवाईकर रसिकांच्या कायम स्मरणात राहण्याचं आणखी एक मोठं कारण म्हणजे सातासमुद्रापलीकडेही गाजलेली त्यांची सुंदर कादंबरी “ मुंगी उडाली आकाशी “. ही कादंबरी श्राव्य माध्यमातूनही ते रसिकांसमोर सादर करायचे. म्हणजे हे “ एकपात्री अभिनव कादंबरी – वाचन “ त्यांनी स्वतः केलेले होते. निवेदन आणि विशेष म्हणजे त्याचे संगीत-संयोजनही त्यांनीच केलेले होते. या कादंबरी-वाचनाच्या कॅसेट्स प्रचंड लोकप्रिय झाल्या होत्या, आणि अजूनही आहेत. श्री संत ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे यांच्या जीवनावर रेखाटलेली ओघवत्या भाषेतली ही कादंबरी म्हणजे अंतःकरणाला पीळ पाडणारी खरोखरच एक अनमोल कथा आहे.
श्री. गोवाईकर यांना त्यांच्या आजच्या स्मृतिदिनी विनम्र प्रणाम.
☆☆☆☆☆
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : विकिपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ २१ जुलै – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
राजा राजवाडे
साहित्याच्या विविध प्रांतात लिलया वावर करून सुमारे ऐंशी पुस्तकांची निर्मिती करणा-या राजा राजवाडे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील. देवरूख येथे मॅट्रीकपर्यंत शिक्षण पूर्ण करून ते मुंबईला आले. तेथे खालसा महाविद्यालयात अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयांत बी.ए. केले. मुंबई महानगरपालिकेत काही वर्षे नोकरी केल्यानंतर निवृत्त होईपर्यंत त्यांनी सिडको त नोकरी केली.
त्यांची साहित्यिक कारकिर्द ही विविधांगी आहे. 1962 साली ‘स्त्री’ या मासिकात त्यांची ‘उन्हातलं घर’ ही पहिली कथा प्रसिद्ध झाली. 1980 साली ‘सायाची पाने’ हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. आपला नोकरीचा व्याप सांभाळून त्यानी कथा, कादंबरी, ललित, विनोदी कथा व कादंबरी, व्यक्तिचात्रण, चित्रपट कथा लेखन असे विपुल लेखन केले आहे. याशिवाय सलग 35 वर्षे ते विविध नियतकालिकांमधून व मासिकांतून लेखन करत होते. दैनिक ‘तरूण भारत’ मध्ये त्यांनी संपूर्ण वर्षभर ‘उतरती उन्हे’ हे सदर चालवले होते.ललित मधील ‘उदंड झाली अक्षरे’, सोबत मधील ‘सप्तरंग’, मार्मिक, धर्मभास्कर, नवशक्ती, रत्नागिरी टाईम्स, अशा दैनिक व मासिकातून त्यांनी स्तंभलेखन केले आहे. ‘मराठी बाणा’ या दिवाळी अंकाचे संपादन करून मराठी भाषेवरील प्रेम सिद्ध करून टिकाकारांना उत्तर दिले होते. साहित्य, भाषा, याविषयी त्यांनी आपली मते परखडपणे मांडली. कोकण म. सा. परिषदेच्या माध्यमातून त्यांनी मराठी भाषा, साहित्य यासंबंधी अनेक उपक्रम यशस्वी केले. परिषदेच्या ‘झपूर्झा’ या त्रैमासिकाचे संपादनही केले.
स्वाभिमान व परखडपणा बरोबरच मित्रांबद्द्ल अपार स्नेह व हळवेपणा हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य होते. ‘दोस्ताना’ या त्यांच्या व्यक्तिचित्रण संग्रहात ते दिसून येते. अनेक नामवंत साहित्यिकांशी त्यांचा दोस्ताना होता.
30 कादंब-या, 14 विनोदी कादंब-या, 9 कथासंग्रह, 9 विनोदीकथासंग्रह, 4 कवितासंग्रह, 3 ललितलेख संग्रह, 1 व्यक्तिचित्रण संग्रह व 3 चित्रपट कथा लिहून त्यांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. सर्व पुस्तकांची सविस्तर नावे देणे, शब्दमर्यादेमुळे शक्य नसले तरी ‘धुमसणारं शहर’, ‘कार्यकर्ता’, ‘अस्पृश्य सूर्य’, ‘दुबई-दुबई’ यासारख्या गाजलेल्या पुस्तकांचा उल्लेख करावाच लागेल.
एकवीस जुलै 1997 ला एका अपघातात त्यांचे निधन झाले.त्यांची जीवन यात्रा संपली पण साहित्य क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ प्रवास अनमोल ठेवा मागे सोडून गेला आहे.
त्यांच्या चतुरस्त्र लेखणीस सलाम!
☆☆☆☆☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : विकिपीडिया, मराठीसृष्टी.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २० जुलै – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
वा. म. जोशी.
वामन मल्हार जोशी (21 जानेवारी 1882 – 20 जुलै 1943) हे लेखक, पत्रकार होते.
एम. ए.झाल्यावर ते ‘राष्ट्रीय’ शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले.
नंतर जोशींनी ‘विश्ववृत्त’ नावाचे ‘राष्ट्रीय’ मासिक काढले. त्यातील ब्रिटिश कार्यकर्त्यांच्या विरुद्ध असलेल्या मजकुरामुळे त्यांना तीन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली गेली.
तुरुंगातून सुटल्यावर जोशी दोन वर्षे दैनिक केसरीचे संपादक होते.
पुढे ते महर्षी कर्वेंनी स्थापन केलेल्या महिला महाविद्यालयात तत्त्वज्ञान, मानसशास्त्र व इंग्रजी-मराठी साहित्याचे प्राध्यापक झाले.
कालांतराने जोशी पुण्याच्या एस.एन.डी.टी.महाविद्याल याचे प्राचार्य म्हणून निवृत्त झाले.
वा. म. जोशींनी, ‘आश्रमहरिणी’, ‘इंदू काळे व सरला भोळे’, ‘नीति-शास्त्र-प्रवेश’, ‘विचार सौंदर्य’, ‘सुशिलेचा देव’ इत्यादी अनेक पुस्तके लिहिली.
वा. म. जोशी यांच्यावर ‘वा. म. जोशी -चरित्र आणि वाङ्मय’, ‘वा. म. जोशी साहित्यदर्शन’, ‘वामन मल्हार आणि विचार सौंदर्य’ इत्यादी पाच पुस्तके लिहिली गेली आहेत.
1930च्या मडगाव, गोवा इथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद वा. म. जोशींनी भूषवले होते.
☆☆☆☆☆
डॉ. रघुनाथ विनायक हेरवाडकर
डॉ.रघुनाथ विनायक हेरवाडकर (25सप्टेंबर 1915 – 20 जुलै 1994) हे इतिहासविषयक लेखन व बखरींचे संशोधन करीत.
त्यांचे शिक्षण एम.ए., पीएच.डी. असे झाले होते.
ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते.
ते बखर वाङ्मयाने मोहित झाले. व त्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले.
त्यांना 140 बखरी उपलब्ध झाल्या. त्यापैकी 78 बखरी ऐतिहासिक होत्या. त्या मोडी लिपीत होत्या. शिवाय त्यांत असणाऱ्या अरबी, फारसी, उर्दू शब्दांच्या अनेक अर्थांतून बखरकाराला अभिप्रेत असलेला नेमका अर्थ शोधून काढणे, हे खूप गुंतागुंतीचे असे.पण हे सर्व त्यांनी केले. एखाद्या मुद्यावर सर्वंकष आधार शोधून, समतोल मनाने त्याचा विचार करून ते संपादन करत. त्यांचे लेखन व संपादन शैली अतिशय पद्धतशीर होती.
त्यांनी ‘पानिपतची बखर’, ‘सप्तप्रकरणात्मक चरित्र’, ‘श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज व थोरले राजाराम महाराज यांची चरित्रे ‘ इत्यादी बखरींचे संपादन करून त्यांनी त्या पुनःप्रकाशित केल्या. याच विषयावर प्रबंध लिहून त्यांनी पीएच.डी. मिळवली.
याव्यतिरिक्त त्यांनी ‘भाऊसाहेबांची बखर’, ‘मराठी बखर’, ‘ श्रीमंत भाऊसाहेबांची कैफियत’, ‘थोरले शाहू महाराज’ इत्यादी अनेक पुस्तके लिहिली /संपादित केली.
वा. म. जोशी व डॉ. रघुनाथ हेरवाडकर यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली.
☆☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया, पोएम कट्टा.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ १९ जुलै -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर– ई – अभिव्यक्ती (मराठी)
धोंडो विठ्ठल देशपांडे
धोंडो विठ्ठल देशपांडे हे एक नामवंत शिक्षक, फर्डे वक्ते आणि थोर समीक्षक होते. मराठी आणि इंग्रजी या भाषांवर त्यांचे उत्तम प्रभुत्व होते. जगातील अभिजात साहित्याचा आणि संहिताशास्त्राचा त्यांचा गाढ व्यासंग होता. मर्ढेकरांच्या कविता आणि जी. ए. कुलकर्णीच्या कथा यांचे विवेचन त्यांनी आपल्या ग्रंथातून केले. अश्मसार या नावाने मराठी समीक्षेत त्यांनी केलेल्या लेखणामुळे मोलाची भर पडली आहे. धो. वि, देशपांडे हे शिक्षक मतदार संघातून दोन वेळा विधान परिषदेवर निवडून गेले होते.
बुद्धिमता, तर्कसंगत युक्तिवाद आणि डौलदार वक्तृत्व यामुळे त्यांची भाषणे प्रभावी होत. शिक्षकांचे प्रश्न त्यांनी पोटतिडकीने मांडले आणि शिक्षणाचा दर्जा उंचवला पाहिजे असा सतत आग्रह धरला, देशपांडे हे कोणत्याही पक्षाच्या चौकटीत बसले नाहीत. साहित्य क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात आणि सार्वजनिक जीवनात ते व्यक्तिवादी होते.
आज त्यांचा स्मृतीदि. त्यानिमित्त त्यांना सादर अभिवादन.
☆ ☆ ☆ ☆ ☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, साप्ताहिक साधना टीम
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १८ जुलै – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे– ई – अभिव्यक्ती (मराठी)
उपेक्षितांच्या अंतरंगाचा वेध घेणारे, आणि परिवर्तनाला फक्त चालनाच नाही तर दिशाही देणारे साहित्यिक , लोककवी , आणि समाजसुधारक म्हणून सुपरिचित असणारे श्री. तुकाराम भाऊराव उर्फ अण्णा भाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन . ( १/८/१९२० – १८/७/१९६९ ) .
सुरुवातीला मार्क्सवादी आणि नंतर आंबेडकरवादी विचारसरणी अवलंबणारे श्री. अण्णा साठे यांच्या साहित्याचे योगदान महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि सामाजिक परिवर्तनात महत्वाचे ठरलेले आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जनमानसात रुजवण्याचे आणि त्या चळवळीसाठी लोकांना प्रेरित करण्याचे महत्वाचे काम करण्यात अण्णांचा मोलाचा आणि मोठा वाटा होता. मुख्यतः याच हेतूने त्यावेळी त्यांच्या ‘ लालबावटा कलापथकाचे ‘ कार्यक्रम तेव्हाच्या मुंबई प्रांतातल्या जवळपास सर्वच भागांमध्ये हजारो ठिकाणी त्यांनी सादर केले होते.
त्यांच्या लिखाणावरून ते उपजतच बुद्धिवान होते आणि बुद्धिवादीही होते असे नक्कीच म्हणायला हवे. त्यामुळे, केवळ आपल्या अतिशय प्रभावी लेखनाच्या माध्यमातून जनजागृतीचे एवढे काम करणारे अण्णा, स्वतः प्रत्यक्षात फक्त दीडच दिवस शाळेत गेले होते, यावर सहज विश्वास बसणार नाही. त्यांच्या याच पथकाच्या माध्यमातून त्यांनी तेव्हाच्या अनेक सरकारी निर्णयांना परिणामकारकपणे आव्हान दिले होते.
पुढे श्री.आंबेडकरांच्या शिकवणुकीला अनुसरून ते दलितांसाठी कार्यरत झाले , आणि दलितांच्या जीवनातले अनुभव आपल्या कथांमधून प्रभावी भाषेत व्यक्त करू लागले—आणि तिथेच ’ पहिला दलित लेखक’ अशी त्यांची ओळख निर्माण झाली. १९५८ साली मुंबईत झालेल्या पहिल्या दलित संमेलनात आपल्या उदघाटनाच्या भाषणातून त्यांनी दलित आणि कामगारवर्गाचे जागतिक स्तरावर असलेले महत्व ठासून अधोरेखित केले.
प्रतिभेचं लेणं लाभलेल्या अण्णांचे बहुतेक सर्व लेखन गंभीर स्वरूपाचे, पोटतिडिकीने लिहिल्याचे आवर्जून जाणवते. त्यांच्या एकूण ३५ कादंबऱ्या, आणि १५ लघुकथा संग्रह प्रकाशित झाले. आणि या संग्रहातल्या बऱ्याच लघुकथांचे इतर अनेक भारतीय भाषांमध्ये आणि २७ अभारतीय भाषांमध्ये अनुवाद केले गेले आहेत. याव्यतिरिक्त ३ नाटके, १२ पटकथा , पोवाडा शैलीतील १० गाणी, आणि ‘ कविता आणि माझा रशियाचा प्रवास ‘ हे प्रवासवर्णनही अण्णांनी लिहिलेले आहे. लेखन मर्यादेमुळे त्यांच्या मोजक्याच साहित्याचा उल्लेख इथे करावा लागतो आहे याचा खेद वाटतो.
१. लोकनाट्य — अकलेची गोष्ट , कापऱ्या चोर , देशभक्त घोटाळे , पुढारी मिळाला , लोकमंत्र्यांचा दौरा ,
शेटजींचे इलेक्शन , मूक मिरवणूक , इत्यादी .
२. कथासंग्रह —कृष्णाकाठच्या कथा , गजाआड , जिवंत काडतूस , निखारा , पिसाळलेला माणूस , फरारी , इ.
त्यांच्या “ फकिरा “ या कादंबरीला सन १९६१ मध्ये राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरीसाठीचा पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या लोककथात्मक शैलीमुळे त्यांचे पोवाडे आणि लावण्या लक्षणीय प्रभावकारक ठरल्या होत्या. त्यांच्या कादंबऱ्यांवर आधारित असणारे – वैजयंता , टिळा लावते मी रक्ताचा , डोंगरची मैना , वारणेचा वाघ , फकिरा , अशासारखे चित्रपटही खूप गाजले .
त्यांच्या व्यक्तित्वावर, कर्तृत्वावर आणि साहित्यावर आधारित असणारी जवळपास १२ पुस्तके वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेली आहेत .
त्यांच्या नावाने “ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ “ स्थापन केले गेले आहे . तसेच त्यांच्या नावाने साहित्य संमेलनही भरवले जाते.
असे बहुरंगी व्यक्तिमत्व लाभलेले, आणि कायम जनजागृतीला वाहून घेतलेलेसमृद्ध साहित्यिक श्री. अण्णा भाऊ साठे यांना त्यांच्या आजच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.
☆☆☆☆☆
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : विकिपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १६ जुलै – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
वासू बेंद्रे
वासुदेव सीताराम बेंद्रे (13 फेब्रुवारी 1894 – 16 जुलै 1986) हे थोर इतिहाससंशोधक होते.
त्याकाळी 16 वर्षांचे झाल्याशिवाय मॅट्रिकची परीक्षा देता येत नसे. बेंद्रेंचा अभ्यास तर 14 व्या वर्षीच पूर्ण झाला होता. ती दोन वर्षे त्यांनी रेल्वे ऑडिटमध्ये विनावेतन काम केले. तीन महिन्यांतच ते शॉर्टहँड व स्टेनोग्राफीत प्रवीण झाले. त्याबद्दल त्यांना सुवर्णपदक मिळाले. त्यांची कामाची तडफ, निष्ठा,निर्णयक्षमता बघून त्यांच्या वरिष्ठानी त्यांना दुसऱ्या लेव्हलचे गॅझेटेड ऑफिसर होण्याचा सल्ला दिला. एज्युकेशन डायरेक्टर जे. जी. कॉन्व्हर्टन यांनी त्यांची क्षमता बघून त्यांना मराठ्यांच्या इतिहासाचं संशोधन करण्यासाठी प्रवृत्त केलं.
त्यांनी पुण्याच्या इतिहास संशोधक मंडळ येथे संशोधन करून लिहिलेला ‘साधन-चिकित्सा’ हा त्यांचा पहिला ग्रंथ होता. हा ग्रंथ तेव्हाच्या इतिहासाकारांनी तर वाखाणलाच, शिवाय त्या क्षेत्रात संशोधन करणाऱ्यांनाही तो मार्गदर्शक ठरला.
बेंद्रे शिष्यवृत्ती मिळवून इंग्लंड व युरोपला गेले. तेथे त्यांनी अनेक ऐतिहासिक दस्तावेजांचा कसून अभ्यास केला. पुरावा असल्याशिवाय ते कोणतीही गोष्ट खरी मानत नसत. त्यापूर्वी शिवाजी महाराजांचं म्हटलं जाणारं चित्र हे दुसऱ्याच व्यक्तीचं होतं.संभाजी महाराजांवर संशोधन करत असताना बेंद्रेनी प्रयत्नपूर्वक शिवाजी महाराजांचं चित्र शोधून काढून ते लोकांसमोर आणलं. तेच चित्र आपल्याला खरे शिवाजी महाराज कसे दिसत, ते दाखवतं.
बेंद्रेनी शिवाजी महाराजांवर दोन खंड लिहिले.
इंग्लंडमधील दस्तावेजांचा अभ्यास करून बेंद्रेनी संभाजी महाराजांचे चरित्र लिहिले. त्यामुळे तोपर्यंत संभाजी महाराजांची असणारी मलीन प्रतिमा खोटी ठरून लोकांसमोर त्यांची उमदे, शूर, विद्वान,प्रतिभाशाली साहित्यिक ही ओळख निर्माण झाली.
बेंद्रेनी संभाजी महाराजांची समाधी शोधून काढून तिचा जीर्णोद्धारही केला.
पेशवे दफ्तराचे डायरेक्टर ऑफ रिसर्च या पदावर काम करताना त्यांनी मोडीत लिहिलेली 4कोटी ऐतिहासिक कागदपत्रे तपासून त्यांची विषयवार व कालानुक्रमे सूची बनवली. सूची बनवण्याच्या पद्धतीवर त्यांनी पुस्तकेही लिहिली. ती अजूनही वापरली जातात.
यानंतर त्यांनी तंजावर दफ्तराचीही सूची तयार केली.
बेंद्रे मुंबई इतिहास मंडळाचे डायरेक्टर व महाराष्ट्र ऐतिहासिक परिषदेचे सी.ई.ओ.होते. या काळात त्यांनी 3 परिषदा भरवल्या,19 त्रेमासिक जर्नलं व 14पुस्तकांचे प्रकाशन केले.
बेंद्रेनी ऐतिहासिक संशोधन व लेखन कसं करावं याविषयी प्राध्यापकांना प्रशिक्षण दिलं.
बेंद्रेनी अनेक विद्यापीठात मराठ्यांच्या इतिहासावर परिषदा घेतल्या.
इंडियन हिस्टॉरिकल रेकॉर्ड्स कमिशन व ऑल इंडिया हिस्टरी काँग्रेसचे ते सल्लागार होते.
इतिहासात हुंडापद्धत अस्तित्वात नव्हती, हे लोकांना पटवून हुंडाविरोधी चळवळीत त्यांनी सक्रिय योगदान दिले. ब्रदरहूड स्काऊट चळवळ व विद्यार्थी संघटनेतही त्यांचा सहभाग होता.
त्यांनी मराठी व इंग्रजीत 60हून अधिक पुस्तके लिहिली. त्यापैकी संत तुकारामांवर 8-9 पुस्तके होती.
मालोजी- शहाजी, संभाजी, शिवाजी, राजाराम यांच्या चरित्रांसाठी त्यांना पुरस्कार मिळाले.
☆☆☆☆☆
नीला सत्यनारायण
नीला सत्यनारायण (5 फेब्रुवारी 1948 – 16 जुलै 2020)या लेखिका व मुलकी अधिकारी होत्या. त्या महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त होत्या.
त्या पूर्वाश्रमीच्या नीला वासुदेव मांडके.
त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या गृहखाते, वनविभाग, समाजकल्याण अशा वेगवेगळ्या खात्यांत काम केले. त्या डायरेक्टर जनरल ऑफ इन्फॉरमेशन अँड पब्लिक रिलेशन्स होत्या.1995-99 या काळात त्या प्रिन्सिपल सेक्रेटरी होत्या.
ऍडिशनल चीफ सेक्रेटरी (रेव्हिन्यू) या पदावरून त्या निवृत्त झाल्या.
निवृत्तीनंतर त्यांची नियुक्ती राज्य निवडणूक आयुक्त या पदावर झाली.
निवृत्तीनंतर त्या एम. आय. टी. सिव्हिल सर्व्हिसेस ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये शासकीय व्यवस्थेवर व्याख्याने देत असत.
त्यांनी मुख्यत्वे मराठीत लिहिले. त्यात 7 कादंबऱ्या, 10 कवितासंग्रह व 2 आत्मचरित्रात्मक पुस्तके वगैरेंचा समावेश होतो.
‘एक पूर्ण अपूर्ण’ यात आपलं करिअर सांभाळून त्यांनी आपल्या डाउन सिंड्रोम असलेल्या मुलाला कसे वाढवले, याचं अनुभवकथन आहे.
‘जाळरेषा’त त्यांच्या करिअरमधील चार दशकांतील अनुभव वाचायला मिळतात. याच्या विक्रीतून मिळालेले उत्पन्न त्यांनी नाना पाटेकरांच्या, शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या एन.जी.ओ.ला दिले.
याव्यतिरिक्त त्यांनी ‘पुनर्भेट’, ‘सत्यकथा’, ‘एक दिवस जीवनातला’, ‘पालकांच्या मार्गदर्शनासाठी केसस्टडी’ वगैरे अनेक पुस्तके लिहिली.
नियतकालिकांत प्रकाशित झालेल्या त्यांच्या लेखांचे ‘आयुष्य जगताना’ व ‘डेल्टा 15’ हे संग्रह प्रसिद्ध झाले आहेत.
त्यांनी अनुवादही केला आहे.
त्यांच्या आयुष्यावर आधारित ‘बाबांची शाळा’ या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन त्यांनीच केले होते.
16 जुलै 2020ला करोनामुळे त्यांचे निधन झाले .
आज वासू बेंद्रे व नीला सत्यनारायण यांचा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त त्यांना सादर अभिवादन.
☆☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈