मराठी साहित्य – काव्यानंद ☆ ‘वेळ झाली भर माध्यान्ह’ कवितेचं  रसग्रहण ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी 

☆  काव्यानंद ☆ ‘वेळ झाली भर माध्यान्ह’ कवितेचं  रसग्रहण ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

ख्यातनाम कवी अनिल यांनी शब्दबद्ध केलेले आणि यशवंत देव यांनी स्वरबद्ध केलेले हे गीत आपल्या धारदार आणि नाविन्यपूर्ण आवाजाने उषाताई मंगेशकर यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.

एरवी सकाळ आणि संध्याकाळ यांचं अप्रूप असणाऱ्या कवींनी उपेक्षिलेली अशी ही माध्यान्ह! यशवंत देवांनी हीच माध्यान टिपून   या गाण्यात पेरली आहे. माध्यान हा शब्द या गीताची लय छान संभाळतो.‘प्रीतीच्या फुला’ या शब्दांवर समेची टाळी येते.

मथळ्यावरुन हे गाणे प्रियकराला उद्देशून असावे असे वाटणारे हे गीत एका कामगार स्त्रीने आपल्या लेकराला उद्देशून म्हटले आहे त्यामुळे हे प्रेम गीत आर्त गीत झाले आहे.

कवी गीतामध्ये ज्या माध्यानीचे वर्णन करतात ती ग्रीष्म ऋतूतील तळपणारी, सर्वांगाची लाहीलाही करून टाकणारी अशी आहे. सूर्य माथ्यावर आल्याने त्याची किरणे जास्ती दाहक आहेत, त्यामुळे तिचे बाळ अर्थात तिचे प्रीतीचे फुल कोमेजून जाईल अशी तिला काळजी वाटते.

उन्हाची तीव्रता दाखवण्यासाठी कवीने ‘तप्त दिशा झाल्या चारी,भाजतसे तसेच सृष्टी सारी’अशा ओळी लिहिल्या आहेत.

निसर्गापुढे मानव हतबल असतो हे तिला गृहीत आहे. म्हणून ती मुलाबरोबर परिस्थितीशी मिळतंजुळतं घ्यायचा आग्रह धरते आहे. ‘कसा तरी जीव धरी’ या ओळीतून ते लक्षात येते.

वारे उष्मा वाहतात आणि बाळाच्या नाजूक देहाला पोळतात. त्यामुळे ती बेचैन आहे.

तिची अगतिकता कवीने फार अचूक शब्दात दर्शवली आहे. तिच्याच पायात पडणारी तिची सावली तिच्या बाळाचे पांघरूण होऊ शकत नाही तसेच तिच्या डोळ्यातील अश्रू हे डोळ्यातच आटतात त्यामुळे ती बाळाची तृषा ही भागवू शकत नाही.‘दाटे दोन्ही डोळा पाणी आटेनयनातच सुकुनी’ या ओळीतून ते दाखवले आहे.

या परिस्थितीत आशेचा एकही किरण तिला दिसत नाही त्यामुळे ती चिंताक्रांत आहे या नीरभ्र आकाशाखाली तिला एक मृगजळ दिसतयं तेही फसव!

तिची खूप तगमग होते आहे पण आयुष्याशी तडजोड करायला हवी म्हणून ती आपल्या बाळाला आपल्या सोबत आनंदाचं एखादं गाणं गुणगुणायला प्रवृत्त करते ‘चल रंगू सारंगात’ या ओळी तो अर्थ देतात

सारंग हा माध्यानी गाण्याचा राग आहे म्हणून या रागाचा उल्लेख कवीने केला आहे.

माध्यान या शब्दावर उषा ताईंचा ठहराव आणि उन शब्दाची मिंड घेऊन गायकी सगळं काही कमाल!…..

कवी अनिल संगीतकार यशवंत देव आणि उषाताई या त्रिकुटाचा हे एक अजरामर गीत!

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

[email protected]

9822553857

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ ‘नवलाख तळपती दीप…कुसुमाग्रज’ कवितेचं रसग्रहण☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

☆  काव्यानंद ☆ ‘नवलाख तळपती दीप…कुसुमाग्रज’ कवितेचं  रसग्रहण ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

विरह आणि प्रेम ही भावना एखाद्या व्यक्तीपुरतीच मर्यादीत असत नाही. एखादा प्रसंग, एखादे ठिकाण, एखादी आठवण ही सुद्धा मनात अशी घर  करून बसलेली असते की मनाला थोडासा धक्का द्यायचा अवकाश, त्या उफाळून वर येतात. घडून गेलेल्या प्रसंगाची,  सहवासाची, आवडत्या ठिकाणाची आठवण आल्याशिवाय रहात नाही. आपले मन किती संवेदनशील आहे, आपल्यावर कोणते संस्कार झाले आहेत आणि आपण ते किती टिकवून ठेवले आहेत यावरच ही प्रेमाची, विरहातून निर्माण होणार्या आर्ततेच्या भावनेची तीव्रता अवलंबून असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कविवर्य कुसुमाग्रजांची ‘नवलाख तळपती दीप विजेचे येथ’ ही कविता.

जीवनाविषयी अखंड आशावादी असणारा, तार्यांशी करार करणारा, क्रांतीचा जयजयकार करणारा हा कवी जेव्हा स्वतःच्या वैयक्तिक सुखदुःखाशी समरस होतो, अंतर्मुख होतो तेव्हा …

परस्पर विरोधी परिस्थितीचे नेमके वर्णन कवीने या कवितेत केले आहे. प्रलोभन आणि संयम यात होणारे द्वंद्व  कवितेत सहजपणे दिसून येते. नेमक्या शब्दांच्या वापरामुळे कवी मोजक्या शब्दात खूप काही सांगून जातो. विजेच्या दीपांना तारकादळे म्हटल्यामुळे त्यांची संख्या, व्याप्ती सहजपणे डोळ्यासमोर येते. श्रीमान इमारतींचा थाट हे शब्द वाचल्यावर मरिन ड्राइव्ह सारखा सागर किनारा आठवत नाही का ? लालस विलासापेक्षा करूण विलासच मन आकृष्ट करून घेतो.

लयबद्ध, प्रवाही अशी ही कविता वाचून झाल्यावर आपण त्यातून लगेच बाहेर पडू शकत नाही. आपण ती कविता पुन्हा वाचतो आणि मनात विचारांचे तरंग उठू लागतात. आपल्यालाही काहीतरी आठवते. हे आठवायला लावणं, विचार करायला लावणं हेच कवितेचं यश आहे.

जाता जाता आठवण होते ती आणखी एका कवितेची. स्वा. सावरकरांच्या ‘सागरा प्राण तळमळला’ या कवितेची. ‘नभी नक्षत्रे’ किंवा ‘प्रासाद इथे……आईची झोपडी प्यारी’ या सारख्या ओळी सहज आठवतात. किंवा गदिमा यांच्या “धुंद येथ मी” या गीतातील शब्दही मनात गुणगुणले जातात. एक चांगली कविता वाचताना दुसर्या एक दोन चांगल्या कविता आठवाव्यात आणि आपला काव्यानंद वाढत जावा ही कविच्या कलाकृतीची यशस्विता नाही काय ?

 

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ ‘पैंजण’ कवितेचं  रसग्रहण☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

(निवेदन – आजपासून कवितेच्या रसग्रहणावर आधारित ‘काव्यानंद’ हे नवीन सादर सुरू करत आहोत. आज प्रथम वाचा, ‘पैंजण’ या कवितेचं रसग्रहण। )

☆  काव्यानंद ☆ ‘पैंजण’ कवितेचं  रसग्रहण☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆ 

‘पैंजण’ ही नीलम माणगावे यांचीनिवेदन – आजपासून कवितेच्या रसग्रहणावर आधारित ‘काव्यानंद’ हे नवीन सादर सुरू करत आहोत. आज प्रथम वाचा, ‘पैंजण’ या कवितेचं रसग्रहण कविता, चार पिढ्यातील ‘स्त्री’च्या स्थिती-गतीचा, मन-विचारांचा वेध घेते. पैंजणाच्या प्रतिकातून अतिशय संवेदनशीलतेने आणि कलात्मकतेने, पिढी-दर-पिढी, भावना-विचारात झालेले परिवर्तन यात दाखवले आहे.

आजी जड, वजनदार पैंजण घालून  आपल्या साम्राज्यात मिरवायची. तिचे साम्राज्य तरी केवढे? स्वैपाकघर, माजघर एवढेच. पण त्यात ती साम्राज्ञीच्या रुबाबात वावरायची. पैंजण पायाच्या घोट्याशी घासले जायचे. पाय दुखायचे. कळ यायची. जखम व्हायची. पैंजण जसे घोट्याशी जखडलेले, तसे मन संसाराशी, परंपरेने आलेल्या संस्काराशी जखडलेले. त्यामुळे दुखलं, खुपलं, तरी ती संस्काराची पट्टी बांधून जखमेला ऊब द्यायची. मनाची समजूत घालायची. आपल्या या राज्यात ती खूश असायची.

आईने जड, वजनदार पैंजण  वापरणं सोडून दिलं. त्याऐवजी ती नाजूक तोरड्या वापरू लागली. परंपरेचं थोडसं जोखड तिने कमी केलं. आपल्या आईपेक्षा ती थोडी मोकळी झाली. तिचा वावर ओसरी, अंगण, गच्ची असा होऊ लागला. तरी पण कधी कधी तोरडीचा हूक अडकायचा. साडीचा जरीचा काठ फाटायचा. दोरे लोंबायचे. जरतारी संसारात थोडं विसंवादाचं फाटकंपण अनुभवाला यायचं, पण तरीही ती आपलं घर, अंगण, गच्ची यात खुशीनं भिरभिरायची.

तिसर्‍या पिढीतली ‘मी’ घराच्या फाटकातून बाहेर पडले. भोवतालाचं जग विस्तारलं. मोकळा श्वास घेता येऊ लागला. टोचणं, बोचणं, दुखणं, खुपणं, जखमा नकोत, म्हणून मी पैंजण, तोरड्या दोन्ही टाकून दिल्या. नाजूक, हलके, सॅंडल्स, चपला, बूट ‘मी’ वापरू लागले. तरीही कधी चपला टोचायच्या. बूट चावायचे. पण बाहेर मिळणार्‍या स्वातंत्र्यासाठी, मुक्त श्वासासाठी ’मी’ने हे सगळं सहन केलं.

आता चौथ्या पिढीतली ‘माझी मुलगी’ म्हणते, ‘आई पैंजण, तोरड्या, सॅंडल्स, चपला काहीच नको. पायच होऊदेत कणखर, पोलादी, काटेकुटे तुडवणारे, जखमा सहन करणारे, निदान पुढलं शतक येण्यापूर्वी….’ मुलीला आत्मभान आलय. बाहेर येणार्‍या संकटांचा सामना करण्यासाठी आपण आत्मनिर्भर व्हायला हवं, अशी तिची आकांक्षा आहे.

स्वैपाकघर, माजघरात मिरवणारी आजी, अंगण-गच्चीपर्यंत भिरभिरणारी आई, सॅंडलल्स घालून घराबाहेर पडणारी कवितेतली मी आणि, पैंजण, तोरड्या चप्पल, बूट, सॅंडल काही नको. पायच होऊ देत आता… घट्ट, मजबूत, पोलादी’ असं म्हणणारी तिची मुलगी सगळ्या जणी कशा लख्खपणे डोळ्यापुढे उभ्या राहतात.

कविता मुक्तछंदात आहे. प्रत्यक कडव्यात समानार्थी प्रासयुक्त आलेले शब्द कवितेला एक वेगळंच नादसौंदर्य प्राप्त करून देतात. उदा. सांगायचं तर, आजीचे ‘पाय भरून यायचे, दुखायचे, खूपायचे, घोटे काळे ठिक्कर पडायचे. किंवा जखम व्हायची, चिघळायची….’ किंवा नाजूक तोरड्या घालायला सुरुवत करताना आई म्हणते, ‘ना पाय दुखणं , ना खुपणं, ना चिघळणं,’ तर तोरड्याही नको, म्हणताना ‘मी’ म्हणते, अडकणं, बोचणं, चिघळाणं, फाटणं काहीच नको. …’ असे शब्द वाचताना वाटतं, ‘शब्दांनो मागुते या’ असं कवायत्रीला म्हणावंच लागलं नसणार. शब्द आपोआपच तिच्या लेखणीच्या मागे मागे आले असणार.

२०व्या शतकाच्या अखेरीस लिहिलेली ही कविता. स्त्रीमुक्तीचा प्रवास ती अगदी सहज-साधेपणाने अधोरेखित करते. कुठेही आक्रोशी स्वर नाही. कमीत कमी शब्दातून अतिशय कलात्मकतेने ही वाटचाल कवयत्रीने आपल्यापुढे मांडली आहे.

महाराष्ट्र राज्यशिक्षण मंडळाने इयत्ता 11 वी साठी मराठी भाषेचे जे पाठपुस्तक तयार केले आहे, त्या ‘युवा भरतीत’ नीलम माणगावे यांच्या ‘पैंजण‘ या कवितेचा समावेश आहे.

 

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print