☆ कुंपण…. कवी कै. वसंत बापट ☆ रसग्रहण.. श्रीमती अनुराधा फाटक ☆
कवी कै. वसंत बापट
जन्म – 25 जुलाई 1922
मृत्यु – 17 सितम्बर 2002
कुंपण
आई आपल्या घराला
किती मोठं कुंपण
तारामागे काटेरी
कां ग रहातो आपण?
पलिकडे कालव्याजवळ
मोडक्या तुटक्या झोपड्या
मुलं किती हाडकुळी
कळकट बायाबापड्या
लोक अगदी घाणेरडे
चिवडतात घाण
पत्रावळीतले उष्टे म्हणजे
त्यांचे जेवणखाण !
काळा काळा मुलगा एक
त्याची अगदी कमाल
हातानेच नाक पुसतो
खिशात नाही रुमाल
आंबा खाऊन फेकली
मी कुंपणाबाहेर कोय
त्यानं म्हटलं घेऊ कां?
मी म्हटलं होय
तेव्हापासून पोटात माझ्या
कुठतरी टोचतयं गं
झोपतानाही गादीमध्ये
कुंपण मला बोचतयं गं !
कवी कै. वसंत बापट
आपल्या घरापेक्षा वेगळे वातावरण बघणाऱ्या बालमनाला पडलेले प्रश्न आदरणीय कवी वसंत बापट यांनी मुलाच्याच शब्दातून या कवितेत मांडले आहेत
सुस्थितीतील एका कुटुंब
झोपडपट्टी जवळच्या सर्व सोयीनी युक्त एका शानदार
घरात रहायला आल्यावर त्या घरातल्या बाल्यावस्थेतील एका मुलाचे घराभोवती फिरणे,
निरीक्षण करणे सुरु झाले तेव्हा
‘आपल्या घराभोवती एक काटेरी कुंपण असून त्याच्या जवळ असलेल्या मोडक्या तोडक्या झोपड्या त्याला दिसल्या.अशा झोपड्या कधीच न पाहिलेल्या त्याची झोपड्या व त्यात रहाणाऱ्या माणसांबद्दलची उत्सुकता वाढली.कुंपणाजवळ उभा राहून तो निरीक्षण करू लागला. ते पहात असताना त्याच्या मनात जे बालसुलभ प्रश्न निर्माण झाले ते तो आईला विचारू लागला.
‘आई, आपण रहातो त्या घराभोवती मोठे काटेरी कुंपण कां आहे? आपल्या समोरच्या त्या मोडक्या तोडक्या झोपडपट्ट्या आहेत तेथे कितीतरी मुलं असून ती हाडकुळी असून तिथल्या बायाबापड्या कळकट असतात. ही घाणेरडी माणसे आपण टाकलेल्या पत्रावळीतले अन्न चिवडतात, जेवण म्हणून खातात. त्यातला एक काळा मुलगा खिशात रुमाल नसल्याने हातानेच नाक पुसतो. आंबा खाऊन मी कोय फेकली ती त्याने मला विचारून घेतली.
तेव्हापासून आई मला काहीतरी वाटते,
झोपलेल्या मऊ गादीवर मला कुंपण बोचतेयं ‘
कविवर्य वसंत बापट यांनी मुलाच्या मनातील प्रश्नातून समाजाचे विदारक चित्र आपल्यासमोर उभे केले आहे कुंपण हे गरीब आणि श्रीमंत यांच्यामध्ये असलेल्या दरीचे प्रतिक असून ते साधेसुधे नाही तर काटेरी आहे गरीब हे शेवटपर्यंत गरीबच रहाणार आणि श्रीमंत आपल्याजवळ कोणी येऊ नये स्वतःभोवती कुंपण घालणार. श्रीमंत, गरिबांचे खाणे,रहाणीमान यातील तफावत बालवृत्तीला न समजल्याने त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाले .मऊ गादीवर त्याला झोप येत नाही. तर घराभोवतीच्या कुपणाचे काटे त्याला टोचतात म्हणजे असे कां? आपण आंबा खायचा आणि त्यांनी कोय कां? त्याना केव्हा आंबा मिळणार?आपल्या घराभोवतीचे काटेरी कुंपण निघाले तर….त्याना काहीतरी देता येईल. कधी निघणार हे कुंपण ही अस्वस्थता,’ मऊ गादीमध्ये कुंपण बोचते या ओळीतून जाणवते.
लहान मुलांना पडणारे प्रश्न मोठ्यांना पडले तरच समाजभान जागे होईल असाही या कविता लेखनाचा हेतू असावा.समाजदरी कमी करण्याचा एक प्रयत्न म्हणजे ही कविता असे वाटते.विचार प्रवृत्त करणारी ही कविता बरेच काही सांगून जाते.
☆ प्रिय विणकरा….शांताबाई शेळके ☆ रसग्रहण.. श्रीमती अनुराधा फाटक ☆
प्रिय विणकरा
मलाही तुझे कौशल्य शिकव
प्रिय विणकरा..
नेहमी तुला पाहिलं वस्त्र विणताना
जेव्हा एखादा धागा तुटतो किंवा संपतो तेव्हा
दुसरा त्यामध्ये गुंफून
तू पुढे विणू लागतोस
तुझ्या या वस्त्रात पण
एकही गाठ
कुणाला दिसत नाही
मी तर फक्त एकदाच
विणून पाहिलं होतं
एका नात्याचं वस्त्र
पण त्याच्या साऱ्या गाठी
स्पष्ट दिसताहेत
प्रिय विणकरा
– शांता शेळके
कवी गुलजार यांच्या,’ यार जुलाहे ‘ या हिंदी कवितेचा अनुवाद !
एखाद्या विणकराच्या घराशेजारी कवीचे वास्तव्य असावे.तो रोज विणकराचे विणकाम बघत असावा. हळूहळू कविच्या मनात विणकराच्या कामाबद्दल इतका आदर निर्माण झाला असावा की त्याचे कौतुक वाटता वाटता तो कवीचा प्रिय मित्र बनला असावा.एक दिवस तो विणकराला म्हणला असणार,
‘ हे प्रिय विणकरा मी तुला नेहमी वस्त्र विणताना बघतो.किती सुंदर वस्त्र विणतोस..वस्त्र विणताना एखादा धागा जर तुटला किंवा संपला तर त्यात तू दुसरा धागा इतका सहजपणे गुंफतोस की असा जोडलेला धागा न ओळखण्याइतका सफाईदार असतो की धागा जोडलेल्या ठिकाणी बारीकशी ही गाठ दिसत नाही इतके दोन्ही जोड एकरूप झालेले असतात.
माणसाच्या नात्याचेही असेच आहे.दोन नाती अशी जोडली गेली पाहिजेत की दोन्ही एकच,एकरुप झाली पाहिजेत तरच आयुष्याचे तलम वस्त्र तयार होईल.’
प्रिय विणकरा असा विचार करून मी एकदाच एक नात्यांचे वस्त्र विणायला घेतले नाती जोडायला गेलो पण विचार एकरूप न झाल्याने त्या वस्त्रावर अविचार, गैरसमज, मतभेदांच्या गाठी दिसू लागल्या.प्रिय विणकरा त्यामुळे दुसरे वस्त्र विणावेसे वाटलेच नाही.
या कवितेत कविला अभिप्रेत असलेला विणकर म्हणजे सुविचारी,एकमेकांच्या विचारांचा सांधा जो आपल्या कौशल्याने दुसऱ्याचे दोष सुविचारात परिवर्तित करतो.आयुष्याचे तलम वस्त्र विणण्यात यशस्वी होतो.आणि कवी हा त्यातला दुसरा घटक ज्याला हे कौशल्य प्राप्त करता आले नाही त्यामुळे तो नाती जोडू शकला नाही, टिकवू न शकणारा असा अप्रिय विणकर ठरला.
कवी गुलजार यानी अगदी सहजपणे नात्यांची जोडणी कशी होते,तोडणी कां होते हे मार्मिकपणे सांगितले असून आदरणीय कवियत्री शांता शेळके यानी अतिशय सुंदर असा अनुवाद केला आहे
तेव्हा आपण नात्याची तोडणी न करता जोडणी करू या .आताच्या विस्कळीत समाजमनाला त्याची नितांत गरज आहे.
☆ अजून त्या झुडुपांच्या मागे……कवी वसंत बापट ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆
वसंत बापट यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमीत्त…
वसंत बापट यांचे खरे नाव विश्वनाथ वामन बापट. पण त्यांचे साहित्यविश्वातले प्रसिद्ध नाव मात्र वसंत बापट कवी, ललीत गद्यलेखक. प्रवासवर्णनकार, स्वातंत्र्यशाहीर, वक्ता, प्राध्यापक म्हणून जनमनात त्यांची प्रतिमा आहे..
वसंत बापटांच्या आयुष्याची घडण आणि त्यांची कविता यांच्यात निकटचे नाते आहे. सामाजिक आणि राष्ट्रीय अंदोलनाच्या काळात, समाजात जागृती निर्माण व्हावी म्हणून त्यांनी काव्य लेखन केले. जनजागरण हे त्यांच्या प्रारंभीच्या कवितेचे प्रयोजन होते. राष्ट्रीय गीते, स्फूर्तीगीते, पोवाडे, वगनाट्ये, लिहीली. त्यामुळे त्यांच्या कवितेचे रुप प्रचारात्मक होते.
पण तरीही बापट मूलत: प्रेमकवीच आहेत.
कवी स्व वसंत बापट
प्रेमभावनाआणि निसर्ग चित्रण यांचे सहचर्य बापटांच्या कवितेत दिसून येते.प्रेमभावनेच्या अविष्कारासाठी पार्श्वभूमी म्हणून बापटांनी निसर्ग जवळ केला आहे…
अशीच एक मनातली कविता अथवा ओठावरचं गाणं,अगदी ह्रदयात वसलेलं म्हणजे…
अजुन त्या झुडपांच्या मागे
सदाफुली दोघांना हसते
,अजुनी आपुल्या आठवणींनी
शेवंती लजवंती होते..
तसे पहाया तुला मला ग
अजुन दवबिंदु थरथरतो
अर्ध्यामुर्ध्या कानगुजास्तव
अजुन ताठर चंपक झुरतो..
अजुन गुंगीमधे मोगरा
त्या तसल्या केसांच्या वासे
अजुन त्या पात्यात लव्हाळी
होतच असते अपुले हासे
अजुन फिक्कट चंद्राखाली
माझी आशा तरळत आहे
गीतांमधले गरळ झोकूनी
अजुन वारा बरळत आहे…
हे गाणं आठवणीतलं.वारंवार ऐकावं असं..
अतंत्य हळुवार आणि भावपूर्ण काव्य!
या काव्यात गतायुष्यातल्या प्रेमाच्या मधुर सुखद आठवणी आहेत.त्या आठवताना कवीचं मन अत्यंत कोमल झालेलं आहे.अगदी फुलासारखं नाजुक नितळ सुगंधी..
अजुन त्या झुडपांच्या मागे सदाफुली दोघांना हसते..
इथे झुडुप याचा अर्थ चाकोरीत गुंतलेलं जीवन.
आणि त्या झुडपाच्या मागे प्रीतीच्या आठवणी दडल्यात .आणि त्याकडे पाहून मनातली सदाफुलीही अशीच हळुच हसते…
या संपूर्ण कवितेत प्रीतीविषयक भावनांना सदाफुली, शेवंती दवबिंदु ,चंपक मोगरा लव्हाळी यांचं रुप दिलं आहे…
तसे पहाया तुला मला ग अजुन दवबिंदु थरथरतो…
ताठर चंपक झुरतो..
विसरायचंच असा निर्धार केलेल्या मनाला ताठर चंपकाची उपमा दिली आहे…पण उत्कट भावनांमुळे त्याचा ताठरपणा लवचिक होतो आणि अंतस्थ तो झुरत आहे..
प्रेमकाव्य उलगडतांना, या निसर्गातल्या कोमलतेचा त्यांनी रुपकात्मक आधार घेतला आहे… दवबिंदुंचं थरथरणं, झुरणारा चंपक या कवीच्या अस्तित्वाचाच भाग आहेत. भावनांना यांत सहज गुंतवले आहे… एकेकाळचे त्यांच्या प्रीतीचेही ते साक्षीदार अजुनही मनांत दडलेले आहेत… पुन्हा एकदा मीलनाची ओढ असणार्या कवीमनाला हे कुठेतरी आतून जाणवत आहे..
प्रेयसीच्या आठवणींनी थरथरणं, झुरणं हे व्यक्त करताना त्यांनी किती सुंदर निसर्ग चित्रच मनासमोर साकारलं आहे.
कवीने प्रांजळपणे सांगितलं आहे की पात्यांमधल्या लव्हाळ्याचं हंसणं,तिच्या केसात माळलेल्या मोगर्याचा सुगंध अजुनही मनात तसाच दरवळत आहे.
शेवटच्या कडव्यात कवी अधिक भावुकआणि आशावादी आहे.
अजुन फिकट चंद्राखाली
माझी आशा तरळत आहे
गीतामधले गरळ झोकूनी
अजुन वारा बरळत आहे..
फिकट चंद्राखाली हे शब्द प्रीतीच्या अंधुक धूसर
पूर्णत्वासाठी आहे..अंत:र्मनात एक कोंडलेला वारा अजुनही आहे आणि तोच मनातलं हे मीलनाच्या आशेचं गरळ या माझ्या गीतांतून बरळत आहे…
यात गरळ, बरळत आहे हे कठोर शब्द संस्कारक्षम मनावर चढवलेल्या मुखवट्यांना प्रवाहाविरुद्ध जाऊन फोडणार्या मानसिकतेसाठी वापरले आहेत.
बाकी शब्दांची कोमलता,आणि भावनांचा झुळझुळता काव्यरुपी झरा अत्यंत नादमयआणि लयबद्ध आहे..खरोखरच ,मनावर हळुहळु पांघरत जाणारी ,धुंद करणारी ही प्रेमाची काव्यरचना आहे..
☆ जिना…कवी वसंत बापट ☆ रसग्रहण.. श्रीमती अनुराधा फाटक ☆
जिना
कळले आता घराघरातून
नागमोडीचा जिना कशाला
एक लाडके नाव ठेवुनी
हळूच जवळी ओढायला
जिना असावा अरुंद थोडा
चढण असावी अंमळ अवघड
कळूनही नच जिथे कळावी
अंधारातील अधीर धडधड
मूक असाव्या सर्व पायऱ्या
कठडाही सोशिक असावा
अंगलगीच्या आधारास्तव
चुकून कोठे पाय फसावा
वळणावरती बळजोरीची
वसुली अपुली द्यावी घ्यावी
मात्र छतातच सोय पाहुनी
चुकचुकणारी पाल असावी
जिना असावा असाच अंधा
कधी न कळावी त्याला चोरी
जिना असावा मित्र इमानी
कधी न करावी चहाडखोरी
मी तर म्हणतो-स्वर्गाच्याही
सोपानाला वळण असावे
पृथ्वीवरल्या आठवणीनी
वळणावळणावरी हसावे
– वसंत बापट
‘जिना’ या एका साध्या शब्दावरचे कवी वसंत बापट यांचे काव्य वाचताना कवी केशवसुत यांच्या,’ साध्याही विषयात आशय मोठा किती आढळे ‘ या ओळींची आठवण होते.एक मजल्यापेक्षा अधिक मजल्यांच्या घराने जिना निर्माण केला आणि तो कवितेचा विषय बनला.
ही कविता लिहिताना पहिल्याच कडव्यात कविने जिनाच्या बारशाची तयारी दाखवली आहे.आपल्या घरातल्या जिन्याला आपण आपलं आवडत नाव ठेवावं .त्या नावाचे स्मरण होताच जिन्यात जाऊन बसावयासाठीच त्या नावाची गरज !प्रत्येक घराला जिना असावा असे कवीला वाटते. हा जिना नागमोडी वळणाचा असावा कारण असे वळण घेताना लहानपणापासून सर्वांना वेगळे वाटते. वळणातला वेगळेपणा वर्णन न करता येण्यासारखा असतो. जिना सावकाशपणे चढता यावा,जातायेता कुणीतरी धक्का द्यावा अशी ही कल्पना, जिना अरुंद असावा असा विचार करणाऱ्या कविच्या मनात असावी. तो थोडा अवघड असावा म्हणजे जिना चढताना बसता येते,जिन्याशी बोलता येते. जिन्यातला अंधारही कविला हवासा वाटतो.अंधारात धडपडत चालणे हे सर्व कविच्या मनाला गुदगुल्या, करणाऱ्या गोष्टी वाटतात.
कधी कधी कविता पायरीवर एकांतात बसून हितगुज करावेसे वाटणे कवीच्या,’ मुक्या पायऱ्या’ या शब्दातून व्यक्त होते.जिना चढताना पडणे,खरचटणे आपल्याला सहन करावे लागते पण लोकांचे हे वागणे सोशिक जिना सहन करतो अशी कवी कल्पना आहे.जिन्याच्या वळणावळणाच्या जिन्यावर चालणारी गुप्त चर्चा, देवाण घेवाण, लाडिक बळजोरी बरोबर नाही असे वाटून जिन्यावरच्या छतावर आडोशाला बसलेली पाल चुकचुकत असावी,तिचे ते चुकचुकणेही गरजेची मानणारा कवि वळणाला महत्त्व देतो. जिन्याला आंधळा म्हणतो.
जिना प्रकारात कविला ‘ स्वर्ग सोपान’ अधिक आवडतो कारण स्वर्गात पटकन जाता येत नाही.कवितेच्या या विचारात कुंतीच्या गजगौरी व्रत उद्यापनासाठी स्वर्गातला हत्ती आणण्याकरिता अर्जुनाने तयार केलेल्या बाणांच्या जिन्याची आठवण होते
वसंत बापटांची अतिशय सुंदर अशी ही कविता आयुष्यातील चढ उतारांचे रूपक ठरावी अशी आहे.जिन्याचे वर्णन करताना कविनी वापरलेले शब्द आयुष्यात येणाऱ्या प्रसंगाशी तंतोतंत जुळणारे वाटतात.
आजच्या फ्लॅटसिस्टिमच्या जमान्यात लिफ्टचा वापर करणारे या कवितेतील शब्दानंदाना नक्कीच मुकतील.
आयुष्याचे चढउतार समजण्यासाठी जिना हवा आणि तोही कवि श्री. वसंत बापट यानी आपल्या कवितेत रंगविल्याप्रमाणेच असावा.एक अप्रतिम कविता असे या कवितेचे वर्णन करता येईल.
☆ रिकामे मधुघट… भा. रा. तांबे ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
भास्कर रामचंद्र तांबे
काव्यानंद. : रिकामे मधुघट अर्थात मधु मागसी माझ्या…
काही कवींच्या रचना या इतक्या अर्थपूर्ण असतात की स्वर आणि संगीताच्या दुनियेत रमणा-या कलावंतालाही त्या आकृष्ट करून घेतात.शब्दांना स्वर आणि संगीताचा साज चढला की त्या काव्याचे एका सुमधूर भावगीतात रूपांतर होते आणि मग ते काव्य रसिकांच्या ओठावर विराजमान होते. अशा कवींपैकी एक कवी म्हणजे राजकवी भा. रा. तांबे. तांबे यांच्या रचनांना शंभर वर्षे होऊन गेली पण त्या काव्याचे गीत कधी झाले समजलेही नाही. सुस्वर आणि संगीत लाभूनही गीतातील मूळ शब्द कुठेही हरवलेले नाहीत. हेच कवीच्या शब्दांच सामर्थ्य आहे! कवीवर्य भा.रा.तांबे यांच्या अनेक कविता भावगीते बनून आपल्या समोर आल्या आहेत. त्यातील एक कविता म्हणजे ‘मधुमागशी माझ्या सख्या परी …’
कोण हा सखा? त्याला कोण म्हणत आहे हे? कवीच्या अखेरच्या काळात लिहीली गेलेली ही रचना आहे. एखादी सुंदर कविता कवीकडून व्हावी आणि ती आपल्याला वाचायला मिळावी अशी रसिकाची अपेक्षा आहे. त्यावेळेस कवी त्याला आपल्या शब्दात उत्तर देत आहे .
हा सखा म्हणजे रसिक वाचक. आपल्या प्रिय कविच्या एकाहून एक मधुर रचना वाचून त्याची सवय झालेला हा रसिक वाचक. त्याला काव्याच्या घटातील मधुर रस हवाहवासा वाटतो आहे आणि तो कविला मागतोही आहे. पण कवी मात्र आता त्या मनस्थितीत नाहीय. कमळांच्या द्रोणातून मध पाजावा त्याप्रमाणे कविने आजपर्यंत अनेक उत्तमोत्तम रचना रसिकांच्या सेवेला सादर केल्या. पण आता नाही.कारण आता पैलतीर दिसू लागला आहे. आयुष्याची संध्याकाळ दिसू लागली आहे. बघता बघता संध्या छाया गडद होऊन जातील आणि दिवस ….आयुष्याचा दिवस…. केव्हा संपला समजणारही नाही. आता तू मागावस आणि मी द्याव इतकी ताकद माझ्यात उरली नाही. बागेतील टपोरी, सुगंधी फुलं संपावीत आणि काटेरी कोरांटीच तेवढी उरावी अशी माझी अवस्था झाली आहे. संसाराच मर्म सांगणारी, यौवनाने रसरसलेली, निसर्ग संगीताने नटलेली अशी कविता तुला हवी आहे. पण आता ते शक्य नाही. मनात तशा उर्मी नाहीत आणि हातात तितकी ताकद नाही. तेव्हा आतापर्यंत केलेली काव्यसेवा आठव आणि माझा काव्यमधुघट रिकामा पडला आहे हे समजून घे.
एकिकडे रसिकांची अपेक्षा तर दुसरीकडे कवी ची असमर्थता. पण ती असमर्थता व्यक्त करतानाही कविने किती सुंदर शब्दांची योजना केली आहे हे पाहण्याजोगे आहे.नकार देताना त्रागा नाहीच, उलट रसिकालाच रागावू नको, रोष करू नको अशी विनंती कवी करत आहे. कारण आपली प्रत्येक रचना ही रसिकासाठीच आहे याची जाणीव कवीला आहे. म्हणून तो एकीकडे बळ न करि अशी विनवणी करतो आहे तर दुसरीकडे करि बळ नाही हे मान्यही करतो आहे. एकाच शब्दपंक्तितून दोन अर्थ व्यक्त करण्याची ताकद त्याच्या लेखणीत अजूनही आहे. पण तो मात्र होणा-या अस्ताच्या चाहुलीने मनातून भयभीत झाला आहे.
भा.रा.तांबे यांच्या एकाहून एक सुंदर अशा कवितांपैकी ही एक कविता. काव्यरसाच्या घटातून त्यांनी एक एक काव्याचा पेला रसिकांना अर्पण केला. पण शेवटी शेवटी मात्र त्यांच्या मनात असाहयतेची भावना जागृत झालेली दिसते. पण खरे पाहता ते म्हणतात त्याप्रमाणे त्यांचा मधुघट रिकामा झाला आहे असे वाटत नाही. कारण या काव्याची रचनाही इतकी सुंदर, अर्थपूर्ण, गेय आहे की त्यांच्या इतर कवितांप्रमाणेच त्याचे गीत झाले आणि रसिकांना एक वेगळा आनंद उपभोगता आला. कारण हा काव्यभास्करच आहे. मराठी काव्यक्षितिजावरून तो कसा मावळेल? खरे ना ?
श्री विकास मधुसूदन भावे कला शाखेचा पदवीधर असून रिलायन्स एनर्जी लिमिटेड या कंपनीत ३४ वर्षे नोकरी करून २०१० मध्ये सेवानिवृत्त झाले. ‘ स्वप्नातल्या कळ्यांनो, उमलू नकाच केव्हा….’ यासारखे तरल भावकाव्य लिहिणारे विख्यात कविवर्य कै. म. पां. भावे या त्यांच्या वडिलांकडून त्यांना कवितेचा वारसा मिळाला आहे.
‘त्रिमिती‘ हा कवितासंग्रह प्रकाशित.
चित्रकविता ही त्यांची खासियत आहे.
महाराष्ट्र टाईम्स मधील वाचनीय सदरात त्यांची पुस्तक परिक्षणे प्रसिद्ध झाली आहेत. अनेक नियतकालिके, साप्ताहिके, मासिके व दिवाळी अंकांमधून त्यांच्या कथा, लेख, कविता प्रकाशित झाल्या आहेत.
वडील कविवर्य कै. म.पां.भावे यांच्या ‘अरे संसार संसार ‘ या विडंबन गीतांच्या कार्यक्रमात व अन्य गाण्यांच्या कार्यक्रमात निवेदक म्हणून त्यांचा सहभाग.
रेडिओ विश्वासवर ‘मला आवडलेले पुस्तक‘ या कार्यक्रमात त्यांनी दोन वेळा पुस्तक परीक्षण सादरीकरण केले आहे.
अक्षरमंच कला अकादमी, मुंबई आयोजित राज्यस्तरीय स्पर्धा क्रमांक ४ मध्ये ‘ कलावंत’ या विषयात सर्वोत्कृष्ट काव्यलेखनात त्यांच्या कवितेला दुसरा क्रमांक, अक्षरमंच सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान,कल्याण तर्फे आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखनात ३ रा क्रमांक , फेब्रुवारी २०२० मध्ये मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणेतर्फे भरविण्यात आलेल्या ‘ चांदणे संमेलनात ‘ विडंबन स्पर्धेत दुसरा क्रमांक, ‘ रोज एक कविता ‘ या फेसबुक पेजतर्फे घेण्यात आलेल्या ‘ चित्रावरुन कविता ‘ या स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक अशाप्रकारे बक्षिसे व पारितोषिकांनी ते गौरवांकित आहेत.
☆ काव्यानंद ☆ कौसल्येचा राम…. महाकवी ग. दि. माडगूळकर ☆ श्री विकास मधुसूदन भावे ☆
स्व गजानन दिगंबर माडगूळकर ‘गदिमा’
रसग्रहण: कौसल्येचा राम….
“कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम”.—- कवी, गायक,आणि संगीतकार या तिघांच्याही कौशल्यामुळे हे गाणं केंव्हाही ऐकलं तरी आपल्या हृदयावर राज्य करतं, आणि थोडाफार काळ का होईना, भक्तीचा मळा आपल्या चंचल मनामधे फुलत रहातो. या गाण्याचे शब्द आहेत शब्दप्रभू गदिमा यांचे. भक्ती अशी असावी, दृढ विश्वास असा असावा की परमेश्वर तुमच्या मदतीला धावून यायलाच हवा, हे गदिमा एका ओळीतच सांगतात—
“भाबड्या या भक्तासाठी देव करी काम”
भक्त हा ‘ भाबडा ‘ असावा. परमेश्वरावर अढळ विश्वास आणि निस्सीम भक्ती …. जी कोणत्याही प्रसंगात जराही डळमळीत होत नाही. भाबडा म्हणजे असा माणूस जो आपली सर्व कामं करताना “ईश्वरेच्छा बलियेसी” असा विचार करून प्रत्येक ठिकाणी ईश्वराचं अधिष्ठान आहे अशी मनाची पक्की बैठक तयार करतो.
एक एकतारी हाती भक्त गाई गीत
एक एक धागा जोडी जानकीचा नाथ
कबीराची श्रीरामांच्या प्रती असलेली भक्ती एवढी श्रेष्ठ दर्जाची आहे की एकतारी घेऊन प्रभू रामचंद्रांची स्तुतीभजनं म्हणताना तो देहभान विसरून जात असे. प्रल्हादानं लहान वयात केलेल्या भगवंतभक्तीचं फळ म्हणून विष्णूने नृसिंहरूप धारण करून प्रल्हादाचं रक्षण केलं आणि त्याचा भक्तीमार्ग निष्कंटक केला. तर नामदेवाच्या हट्टापुढे प्रत्यक्ष पांडुरंगाला सगुण रूपात येऊन प्रसाद भक्षण करावा लागला. प्रभू रामचंद्रांनी कबीराची त्यांच्याप्रती असलेली निर्मळ भक्ती पाहून एकतारीच्या पार्श्वभूमीवर एकेक धागा विणत कबीराचं काम करण्यात कोणताही कमीपणा मानला नाही. तुमचा भक्तीभाव आणि भक्तीमार्ग जर खरा असेल तर देवही तुमचं काम करतोच करतो हा विश्वास या घटनेमधून सामान्य माणसाला मिळतो.
दास रामनामी रंगे राम होई दास
एक एक धागा गुंते रूप ये पटास
नामाचा महिमा हा फार मोठाअसतो हे सर्व संतांनी सांगून ठेवलं आहे. राघवाचा निस्सिम भक्त कबीरही आपल्या एकतारीची सुंदर साथ घेत रामनाम घेण्यामधे अगदी रंगून गेला आहे. भक्तांची काळजी देवाला असते असं म्हणतात आणि म्हणूनच कबीराचं काम पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी पुढाकार घेतला आहे. श्रीरामांच्या पवित्र हातातून धाग्याला धागा जोडला जातोय आणि हळूहळू कबीराचा शेला आकार घेतो आहे. पण कबीराला मात्र या गोष्टीचं भान नाहीये. “दास रामनामी रंगे राम होई दास” या शब्दांमधून गदिमांची काव्यप्रतिभा आणि शब्दयोजना या दोन्ही गोष्टींचा एकत्रित अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो.
विणुन सर्व झाला शेला पूर्ण होई काम
ठायी ठायी शेल्यावरती दिसे रामनाम
लुप्त होई राम कौसल्येचा राम
खरी भक्ती आणि खोटी भक्ती यातला फरक माणसाला जरी समजला नाही तरी परमेश्वराला तो निश्चितच कळतो. त्याप्रमाणेच परमेश्वर आपल्या भक्तांसाठी, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांना मदत करायची की नाही हे ठरवत असतो. कबीराची श्रीरामांवर असलेली श्रद्धा आणि भक्ती सर्वज्ञात तर होतीच, पण प्रभू रामचंद्रांनाही त्याच्या भक्तीविषयी खात्री पटली म्हणूनच कबीराची आणखी कोणतीही परीक्षा न घेता स्वहस्ते मदत करून शेला विणून पूर्ण केला. अर्थात प्रभू रामचंद्रांनी स्वहस्ते विणलेल्या त्या शेल्यावर जागोजागी रामनामाची मोहोर उमटली होती. संपूर्ण शेला विणून कबीराचं काम पूर्ण केल्यानंतर मात्र प्रभू श्रीराम तिथून अदृश्य झाले.
हळूहळू उघडी डोळे पाही जो कबीर
विणुनीया शेला गेला सखा रघुवीर
कुठे म्हणे राम कौसल्येचा राम
श्रीरामांच्या भजनामधे तल्लीन होऊन गेलेला कबीर काही काळानंतर भानावर आला. विणून पूर्ण झालेल्या संपूर्ण शेल्यावर जेंव्हा त्याने “श्रीराम” “श्रीराम” अशी अक्षरं पाहिली, तेंव्हा त्याच्या लक्षात आलं कि आजूबाजूचं जग विसरून ज्या दैवताच्या भजनपूजनात तो रंगून गेला होता, त्या प्रभू श्रीरामांनी आपल्या हातांनी कबीराचा शेला विणून, एकप्रकारे त्याचीच सेवा केली होती.
माणिक वर्मा यांच्या आवाजातील “देव पावला” चित्रपटातील या गाण्याला संगीत दिलं आहे महाराष्ट्र भूषण पु ल देशपांडे यांनी. गदिमांनी लिहिलेलं हे गाणं माणिक वर्मा यांच्या गोड आवाजात ऐकताना मनाला ख-या भक्तीची साक्ष पटत जाते.
☆ घाल घाल पिंगा वा-या – कृष्ण बलवंत निकंब ☆ कवितेचे रसग्रहण – सौ. अमृता देशपांडे ☆
घाल घाल पिंगा वा-या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात ll
सुखी आहे पोर सांग आईच्या कानात
आईभाऊसाठी परि मन खंतावत ll
विसरली का ग भादव्यात वर्ष झालं
माहेरीच्या सुखाला ग मन आंचवलं ll
फिरुन फिरुन सय येई जीव वेडावतो
चंद्रकळेचा ग शेव ओलाचिंब होतो ll
काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार
हुंगहुंगुनिया करी कशी ग बेजार ll
परसात पारिजातकाचा सडा पडे
कधी फुले वेचायाला नेशील तू गडे ll
कपिलेच्या दूधावर मऊ दाट साय
माया माझ्या वर तुझी जशी तुझी माय ll
आले भरुन डोळे पुन्हा गळाही दाटला
माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला ll
********
का आणि कसे कुणास ठाऊक, एखाद्या कवितेची, गीताशी, एखाद्या वाक्याशी किंवा व्यक्तिशी आपले नाजुक भावबंध जुळले जातात. कधीही, कुठेही क्षणभर जरी आठवण झाली तरी त्यांच्याशी संलग्न भावना तीव्रतेने जाग्या होतात आणि झपकन मन तिथे पोचतं.
माझंही त्यादिवशी असंच झालं. माझ्या अतिशय आदरणीय प्राध्यापकांनी ह्या कवितेची आठवण करून दिली. सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं गाणंच मला भेट दिलं. हे गाणंअसं मला अचानक भेटेल, अशी मी कधी कल्पना सुध्दा केली नव्हती. मी थोडीशी चकित झाले, खूप खूप आनंदित झाले. ” कशी करू स्वागता ” अशी माझी धांदल उडाली.
ही कविता मी इयत्ता चौथीत असताना पहिल्यांदा ऐकली.मराठी च्या तासाला बाईंनी शिकवायला सुरुवात केली. शब्दांचे अर्थ सांगितले.
पिंगा, मन खंतावतं, चंद्रकळेचा शेव, यांचे अर्थ समजले. कपिला गायीची नंदा कशी खोडकर होती, हे न सांगताच कळलं.पण ” आले भरुन डोळे पुन्हा गळाही दाटला l माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला” हे सांगत असताना बाईंचा आवाज वेगळाच झाला आणि डोळ्यात पाणी आलं, हे जाणवलं. ( तेव्हा बाईंना आज बरं वाटंत नाही असं वाटलं)
पुढे आठव्या इयत्तेत परत या कवितेनं पिंगा घातला. ही कविता परत एकदा अभ्यासक्रमात आली. आतापर्यंत कवितेचे शब्दशः अर्थ समजले होते. आता शिकवताना बाईंनी कवितेचा भावार्थ सांगितला, त्यातल्या स्त्री सुलभ भावनांची घडी उलगडली, आणि तेव्हा अनेक भावना आणि कल्पना मनाच्या उंबरठ्यावर फुलांसारख्या उमलल्या. त्यांची नवी ओळख झाली. तो एक सुंदर अनुभव होता.
” लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीला आपल्या आईची, भावाची, माहेरची आठवण होऊन तिचे मन गलबलते आणि ती भिरभिरणा-या वा-यालाच सांगते की, ” अरे वा-या, असाच पिंगा माझ्या माहेरच्या परसात घाल आणि आईला सांग, मला तिची आणि सगळ्यांचीच खूप आठवण येते. आपली कपिला आणि तिची नंदा यांचीही आठवण येते. परसातला पारिजातकाचा सडा मला खुणावतोय. कधी नेशील मला फुलं वेचायला? कपिलेच्या दुधावरची मऊ दाट साय अजून माझ्या जिभेवर रेंगाळते आहे. आई, विसरलीस का? अग, एक वर्ष झालं भाद्रपद महिन्यात मला इथे येऊन. माहेरी जायला मन आतुरलं आहे. परत परत आठवण येते सर्वांची आणि डोळे भरून येतात, ते पुसून पुसून माझ्या चंद्रकळेचा पदरही ओलाचिंब होतो. “
इतका सारा निरोप ती वा-याला सांगते, पण सुरवातीलाच सांगते कि,
” आईच्या कानात सांग, तुझी लेक सासरी सुखात आहे “.
कारण आईची काळजी तिला ठाऊक आहे, माझी लेक कशी असेल? या विचारात ती हरवली असेल, म्हणून निरोपाच्या सुरवातीलाच ती आईचे मन निर्धास्त करते. आणि मग पुढे ती माहेरच्या आठवणीनी भिजलेला पदर दाखवते. माहेरच्या लाडक्या लेकीचं लग्न झाल्यावर तिला आलेल्या एक प्रकारच्या पोक्तपणाचं , शालीनतेचं हे लोभस रूप.
मन आठवणींनी गदगदून गेलंय. ” आले भरुन डोळे पुन्हा गळाही दाटला, माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला ll ” असं म्हणत ती गप्प होते. आणखी काही बोलणं शक्यच नसतं!
इथेच कविता संपते. मन व्याकुळ असतानाही ती वा-याला विनवीते की, माझ्या माहेरच्या परसात जा आणि सुवासाची बरसात कर.
सुवासाची बरसात ‘ या शब्दातून माहेरी सर्वजण सुखात असोत, सर्वांना स्वास्थ्य मिळो , ही तिच्या मनातली इच्छा ती व्यक्त करते. पृथ्वीतलावरच्या प्रत्येक स्त्रीची , मग ती कोणत्याही वयाची असो, तिच्या मनातली ही भावना कवीने ” माहेरी जा सुवासाची कर बरसात ” पाचच शब्दात व्यक्त केली आहे. सासरी गेलेल्या मुलीच्या अंतःकरणातला एक हळवा कोपरा म्हणजे ” माहेर” . कवी कृ.ब. निकुंब यांनी स्त्री मनाची तरल स्पंदने अतिशय साध्या पण थेट काळजाला भिडतील अशा शब्दात मांडली आहेत.
गायी – वासरे, चंद्रकळेचा उल्लेख, ऐसपैस किंवा टुमदार घर, दारातला पारिजातकाचा सडा या सगळ्या खुणा तो पूर्वीचा काळ सुचवतात.
कृ.ब. निकुंब यांनी ‘ उज्वला’,
‘ उर्मिला’ या काव्यसंग्रहातूनही स्त्रीमनाचे हळुवार तरंग व्यक्त केली आहेत. त्यांच्याच एका कवितेतली ओळ आहे,
” जिथे वाळू-रणी झाले, जीव तृषार्त व्याकुळ l
तेथे होऊ द्या हो रिती,
माझ्या अश्रूंची ओंजळ ll
आता काळ बदलला, सर्वच बदलले. कवितेतले संदर्भ कालबाह्य झाले. पण अजूनही अगदी पन्नाशीतल्या, साठीतल्या, सत्तरीतल्या स्त्रीला विचारलं कि कवितेतल्या खजिन्यातली कुठली कविता तुला वाचायला आवडेल तर ती नक्कीच ही कविता पसंत करेल.
अतिशय संवेदनशील शब्द, काळजाला हात घालणारे भावदर्शन, आणि सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं मन हेलावून टाकणारी व्याकुळता. कविता वाचून झाल्यावर किंवा हे गाणं ऐकत असताना इतक्या वर्षांनी सुद्धा अश्रूंची ओंजळ रिती होतेच. हा परिणाम म्हणजे शब्दांचं आणि स्वरांचं सामर्थ्य म्हणायचं का हळुवार स्पंदनांची परमोक्ती? दोन्हीही.
जेव्हा माझं विश्व माहेर आणि सासर यात विभागलं गेलं, तेव्हा मला कळलं कि ‘ कविता वाचताना बाईंचा आवाज कापरा का झाला, डोळ्यात पाणी का आलं’ . जेव्हा कवितेतल्या संवेदना स्वतः अनुभवल्या तेव्हा या अजरामर गीताच्या ओळी मनात सतत रुंजी घालू लागल्या. आता ते बालपण ही सरलं आणि तारुण्य ही सरलं, माहेरी आईही नाही . आई असलेलं माहेर आणि आई नसलेलं माहेर यात फरक असला तरी ” घाल घाल पिंगा वा-या माझ्या परसात l माहेरी जा सुवासाची कर बरसात ‘ ह्या ओळी कानावर पडल्या कि डोळे भरलेलं मन मागे, आठवणींच्या खुणा शोधत धावतंच. भाऊ- भावजयीच्या संसारात हरवलेलं माहेर शोधत धावतं. माहेराची फुले वेचायला आसुसतं. नकळत जड मनातून शब्द येतात,
” आले भरुन डोळे पुन्हा गळाही दाटला l
माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला ll”
आता भाऊ वहिनी भाचे कंपनी यांच्या रूपातल्या माहेरासाठीही परत मन वायुदूताला निरोप धाडतं,
☆ नाच नाचुनी अति मी दमले – गदिमा ☆ कवितेचे रसग्रहण – डॉ सौ सुषमा खानापूरकर ☆
नाच नाचुनी अति मी दमले
थकले रे नंदलाला
निलाजरेपण कटिस नेसले, निसुगपणाचा शेला
आत्मस्तुतीचे कुंडल कानी, गर्व जडविला भाला
उपभोगांच्या शतकमलांची कंठी घातली माला…
थकले रे नंदलाला….१
विषयवासना वाजे वीणा, अतृप्ती दे ताला
अनय अनीती नूपूर पायी, कुसंगती करताला
लोभ-प्रलोभन नाणी फेकी मजवरी आला गेला…
थकले रे नंदलाला…२
स्वतःभोवती घेता गिरक्या, अंधपणा की आला
तालाचा मज तोल कळेना, सादहि गोठून गेला
अंधारी मी उभी आंधळी, जीव जीवना भ्याला….
थकले रे नंदलाला…..३
रचनाकार गदिमा
माणूस जन्माला येतो त्या क्षणापासून त्याला सतत काहीतरी हवं असतं. जन्मल्याबरोबर श्वास घेण्यासाठी हवा पाहिजे असते. त्यासाठी तर तो रडतो. या जगण्याची सुरुवातच तो काहीतरी हवंच आहे आणि त्यासाठी रडायचे अशी करतो. हे हवेपण (आसक्ती) आणि त्यासाठी रडणे आयुष्यभर सोबतीला घेतो. सुखाच्या शोधात दाहीदिशा वणवण भटकतो. सुखाची साधने गोळा करतो. पण नेमके सुख तेवढे हातातून निसटून जाते आणि दुःख अलगद पदरात पडते. सुखाशी लपंडाव खेळून खेळून शेवटी थकून जातो. पण पूर्वसुकृत म्हणा किंवा पूर्वपुण्याई म्हणा काही बाकी असेल तर जरा भानावर येतो. त्याला समजतं की अरे सुखाचा शोध घेण्यात माझं काहीतरी चुकतंय!
जीवाच्या या भावभावनांची मानसिक आंदोलने गदिमांनी (कलियुगातील ऋषीमुनी) अगदी अचूक टिपली आहेत. लहानपणापासून तारुण्यापर्यंत दारिद्रय दुःख अवहेलना यांचे आतोनात चटके गदिमांनी सोसले. अंतःकरण होरपळून निघाले पण म्हणतात ना, आंबट तुरट आवळ्याचा मधूर मोरावळा करायचा असेल तर त्याला उकळत्या पाण्यात टाकून नंतर टोचे मारुन मग कढत कढत पाकात घालतात. पण त्यामुळेच हा पाक अगदी आतपर्यंत झिरपतो आणि मग मधूर चवीचा औषधी गुणधर्म युक्त मोरावळा तयार होतो.
गदिमांच्या बाबतीतही अगदी हेच घडले. आणि मग भगवत् भक्तीच्या पाकात हे दुःखाने घरे पडली आहेत असे अंतःकरण घातल्याबरोबर त्यातून इतक्या सुंदर अक्षर अभंग रचना बाहेर पडल्या की त्या अगदी संतवाङमयाच्या पंक्तीत जाऊन बसल्या. जग हे बंदीशाला, विठ्ठला तू वेडा कुंभार, गीतरामायण अशी काव्ये लिहून त्यांनी स्वतःबरोबरच रसिकांना सुद्धा एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.
आयुष्यात सुखाचा शोध करुन करून थकलेला हा जीव! जीव हा प्रकृतीच्या आधीन म्हणजे प्रकृतीच. ती स्त्रीलिंगी, आणि परमात्मा पुल्लिंगी! (ही भाषा सुद्धा मायेच्या प्रांतातीलच! बाकी जीवाशिवाला व्याकरणाशी काय देणे घेणे?) म्हणून हा जीव, ही प्रकृती त्या श्रीकृष्ण परमात्म्याला कळवळून सांगतेय की ..
नाच नाचुनी अति मी दमले थकले रे नंदलाला
निलाजरेपण कटिस नेसले निसुगपणाचा शेला
आत्मस्तुतीचे कुंडल कानी, गर्व जडविला भाला
उपभोगांच्या शतकमलांची कंठी घातली माला
थकले रे नंदलाला
आयुष्यभर स्वतःची वासना तृप्त करण्यासाठी नको नको ती सगळी कर्मे केली. तेंव्हा जीवाला (प्रकृतीला) जराही लाज वाटली नाही. हे निलाजरेपण कमरेला वस्त्राप्रमाणे घट्ट बांधले होते. निसुगपणाचा निरुद्योगीपणाचा आळशीपणाचा शेलाही त्यावरुन गुंडाळून घेतला. कधीही कुठलेही सत्कृत्य, मानवतेची सेवा, ईश्वरसाधना करण्याचा आळस मी कधी सोडला नाही. इतके दुर्गूण अंगी असूनही स्वतःच स्वतःची स्तुती करणे, मोठेपणा मिरवणे आणि इतरांकडूनही स्वतःची वाहवा ऐकणे यातच धन्यता मानली. या आत्मस्तुतीने माझा अहंकार सुखावला, मला गर्व झाला, घमेंड आली. पाखंड माजले. तेच या भाळावर कुंकवाचा टिळा लावावा तसे लावून मिरविले. त्या मस्तीतच सगळ्या भौतिक गोष्टींच्या उपभोगात रममाण झाले, सुखावून गेले. खूप नाच नाच नाचले. अखेरीस थकून गेले. या मायिक भौतिक सुखांना आतून दुःखाचे अस्तर, दुःखाची झालर लावलेली आहे याचे भान मला फार उशिरा आले.
नंदलाला, मी थकले रे
विषयवासना वाजे वीणा, अतृप्ती दे ताला
अनय अनीती नूपूर पायी, कुसंगती करताला
लोभ-प्रलोभन नाणी फेकी, मजवरी आला गेला
विषयवासनेची वीणा कानाशी वाजत होती. मनातील वासना तृप्त होण्याचे नाव घेत नव्हती. या अतृप्तीच्या तालावर या वासनेच्या वीणेची तुणतण ऐकत मी बेभानपणे नाचत राहिले. अन्यायी वर्तणूक
अनीतीचे आचरण यांचे जणू पायांत नूपूर बांधले होते. कुमार्गावर पावले नाचत नाचत वेगाने चालली होती. माझ्यासारख्याच दुर्वर्तनी मंडळींची कुसंगती हातांवर टाळ्या देत होती. माझ्याकडून काही हवे असेल तर माझी स्तुती गाऊन ही मंडळी ते ओरबाडून घेतच होती. माझ्यावर लोभ-प्रलोभनांचा वर्षाव करुन मला त्यातून बाहेर पडूच देत नव्हती. विषयोपभोग, खोटी स्तुती, घमेंड, ढोंग/पाखंड या साऱ्या मोहनिद्रेत मी स्वतःलाच विसरून गेले.
नंदलाला, मी थकले रे
स्वतःभोवती घेता गिरक्या, अंधपणा की आला
तालाचा मज तोल कळेना, सादहि गोठून गेला
अंधारी मी उभी आंधळी, जीव जीवना भ्याला
नाचता नाचता स्वतःभोवती गिरक्या घेत होते. ह्या गिरक्यांनी मला भोवळ आली. डोळ्यांपुढे अंधारी आली. आपलं काय परकं काय काहीच दिसेना, काहीच कळेना. या बेताल वागण्याने, नाचण्याने माझा तोल जाऊ लागला. जगण्याचा ताल चुकला, लय चुकली. जीवनसंगीत बेसूर बेताल झाले. माझे कान बधीर झाले. इतके की मला माझ्याच अंतर्मनाची साद, हाकही ऐकू येईना. तो साद गोठून गेला.
भगवंता, आता समजतंय की सुख देण्याची या विषयोपभोगांची क्षमता फार कमी आहे आणि उपभोग घेऊन त्यातून सुख घेण्याची माझ्या इंद्रियांची क्षमता, ताकद सुद्धा फार तोकडी, फार फार अपुरी आहे . खरे सुख कुठेतरी हरवून, हरपून गेले आहे. शोध घेता घेता मी फार थकून गेले,. या अज्ञानाच्या अंधःकारात डोळे असूनही मोहाची पट्टी डोळ्यांवर बांधल्यामुळे आंधळ्याप्रमाणे चांचपडू लागले, ठेचकाळू लागले. जीव आता जगण्याला भ्यायला. जगण्याचीच भीती वाटू लागली. जीवातील चैतन्य हे सत् म्हणजे निरंतर अस्तित्वात असणारे चैतन्य
आहे, तेच साक्षात सुखस्वरूप आहे याचा विसर पडला आणि थकून गेले रे!
☆ एक धागा सुखाचा – गदिमा ☆ कवितेचे रसग्रहण – सौ. विद्या वसंत पराडकर ☆
मराठी सारस्वतांच्या आकाशातील एका दैदिप्यमान ता-याप्रमाणे असणारे,महान लेखक, कविवर्य,गीत रामायण कार ग. दि. माडगुळकर यांच्या
जन्म दिवशी आदरांजली म्हणून त्यांनी च लिहिलेल्या एका अमर कलाकृतीचे म्हणजेच चित्रपट गीताचे रसग्रहण करीत आहे.
हे गीत १९६० च्या “जगाच्या पाठीवर” या चित्रपटाने अजरामर केले आहे.पडदयावर हे गीत “राजा परांजपे” या अष्टपैलू कलाकाराने गायले असून सुधीर फडके यांच्या सुरेल गळ्यातून स्वरबद्ध झाले आहे.हे गीत मराठी मनावर एखाद्या शिल्पा सारखे कोरल्या गेले आहे.
भारतीय संस्कृतीत त्रिवेणी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.हेच महत्त्व साहित्य,कला, संगीत या क्षेत्रालाही आहे. कविवर्य ग.दि.मा. ; संगीतकार गायक सुधीर फडके, जेष्ठ अभिनेते राजा परांजपे या त्रयीनी एका नाविन्यपूर्ण कलाकृतीची म्हणजे एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे म्हणजे हे गीत होय. म्हणून हे गीत मराठी मनावर अधिराज्य करीत आहे. या गीतांवर आजही प्रशंसेचा पाऊस पडत आहे.
“एक धागा सुखाचा”
एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे
जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे
एक धागा सुखाचा…||धृ||
पांघरसी जरी असला कपडा
येसी उघडा, जासी उघडा
कपड्यासाठी करिसी नाटक तीन प्रवेशांचे
एक धागा सुखाचा…
मुकी अंगडी बालपणाची, रंगित वसने तारुण्याची
जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे
एक धागा सुखाचा….
या वस्त्राते विणतो कोण? एकसारखी नसती दोन
कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकऱ्याचे
एक धागा सुखाचा….
– ग.दि.मा.
हे काव्य १५ ओळींचे आहे . ३ कडवे व धृवपद आहे . मानवी जीवनातील एक कटू सत्य कविवर्याने जगा समोर मांडले आहे .
एक धागा सुखाचा , शंभर धागे दुःखाचे” हे त्रिकालाबाधित सत्य आहे . हे सत्य कविवर्यांनी निरनिराळ्या दाखल्यातून स्पष्ट केले आहे . सुख व दुःखाच्या आडव्या व उभ्या धाग्यांनी हे जीवन वस्त्र विणले आहे . प्रत्येकाला या जीवनानुभवाला सामोरी जावे लागेल . प्रत्येक वस्त्र एक सारखे नसते . यात विभिन्नता असते .
मानवी आयुष्यावर तीन अंकी नाटकाचे रूपक केले आहे . नाटकात साधारणतः तीन अंक , तीन प्रवेश असतात . पहिला बाल्य- नैसर्गिक अवस्थेचे वर्णन उदा. “येसी उघडा” अंगडी , “टोपडी” या शब्द सौंदर्याने बालपण संपते .
त्या नंतर जीवन रूपी नाटकाचा दुसरा अंक सुरू होतो . तारुण्याच्या वसंत बहराने . या अवस्थेत शृंगाराला बहर आलेला असतो . उदा.- रंगीत वसने – हे शब्द सौंदर्य स्थल .जीवन रुपी नाटकाचा तिसरा अंक सुरू होतो . “वार्धक्याने” – शब्द प्रयोग – “वार्धक्याची शाल घेऊनच” . वृद्धत्वाच्या विदीर्ण सत्याचे केलेले वर्णन मोठे हृदयभेदक आहे . जीवनाचा शेवट शेवटी “जासी उघडा” या कटू सत्याने केला आहे.
प्रस्तुत काव्यातील उच्चतम बिंदू climax म्हणजे वस्त्रातील विविधता हे तर आहेच , परंतु विणक-याचे वस्त्र विणतांना हात दिसत नाही . कर्ता असून अकर्ता राहतो . ज्या प्रमाणे सूत्रधार , परमेश्वर हा जग चालवतो पण दिसत नाही , पपेट शो मध्ये सूत्रधार दिसत नाही . पण बाहुल्या नाचतात . या सुंदर त्रिकाल बाधित सत्याने काव्याला विराम दिला आहे .
इंग्रजी साहित्यातील प्रसिद्ध नाटककार विलियम शेक्सपिअर म्हणतो ; “जग ही रंगभूमी आहे .” ग.दि.मा म्हणतात “मानवी जीवन हे नाटक आहे”. प्रसिद्ध अभिनेता , दिग्दर्शक राज कपूर ह्याने “मेरा नाम जोकर” मध्ये असेच जीवनाचे तत्वज्ञान मांडले आहे .
वर वर बघता हे चित्रपट गीत वाटत असले तरी मानवाला अंतर्मुख करण्याचा प्रयत्न ह्यातून केला गेला आहे . या गीताद्वारे दिलेला संदेश वास्तविक सत्याची ओळख करून देणारा वाटतो . सारस्वताच्या उद्यानातील हे एक “evergreen” पुष्प आहे असे म्हंटल्यास अतिशयोक्ती होणार नाही . मराठी सारस्वताच्या मंदिरातील नंदा दीपा प्रमाणे हे गीत भविष्यातही प्रकाशमय होईल . “झाले बहू , होतीलही बहू , परंतु यासम नसे , या उक्ती प्रमाणे ते मैलाचा दगड ठरो . याच अपेक्षेत लिखाणाला विराम देते .
वास्तविक ते नाटककार,लघुकथा लेखक,व्यंगचित्रकारही होते…पण साहित्यविश्वात ते कवी म्हणून अधिक ठसले. त्यांच्या कवितेचे एक वैशिष्ट्य, वेगळेपणा म्हणजे,त्यांची मुक्त ,स्वैर कल्पनाशक्ती. वेगळा दृष्टीकोन. त्यांच्या कवितेत आढळणारा व्हिजन. मात्र त्यांच्या व्हीजनमधे त्याच त्याच मनोभूमिकेची बांधिलकी आढळत नाही .विषय एकच असला तरी कवितेतला आशय निराळा भासतो. कल्पनाशक्तीला चौफेर स्वातंत्र्य दिल्याचे जाणवते. कुठल्याही एकाच विचारात ती अडकून पडत नाही ती निरनिराळ्या कोनांतून व्यक्त होते. त्यामुळे सदानंद रेगे यांची कविता ही विशुद्ध वाटते. त्यांच्या कवितेतली भरारी अथवा कोलांटी ,यांचं कुतुहल वाटतं.
त्यांची कविता सर्वसमावेशक आहे. म्हणजे संस्कृती,परंपरा ,अस्मिता,आपली माती अशा वर्तुळात ती गिरक्या घेत नाही…ती संकुचीत नाही.विमुक्त आणि सर्वस्पर्शी आहे.मनमोकळ्या वार्यासारखी आहे.—-मात्र सदानंद रेगे यांची कविता ,गाभार्यातल्या जाड काळोखात ,प्रकाशाचे कण शोधावा तशी आहे..त्यांची कविता वाचताना जाणवतं, की कविता ही कवीचीचअसते. वाचकाचा असतो तो गर्भशोध. दडलेल्या आशयाचा शोध. कधी वाचकाची,कवीच्या मानसिकतेशी नाळ जुळते तर कधी ती अधांतरीही राहते. पण लहान ओळी,ओळीत गुंफलेले शब्द कधी मऊ,कधी भेदक–..पण त्यातून तयार झालेला हा काव्यसर वेगळ्याच तेजाने चमकतो.थक्क करतो.
फसवाफसवीचा डाव आणि चेटूक या दोन्हीही कवितेत श्रावण आहे. पण एकाच श्रावणाच्या माध्यमातून ,व्यथेला पाहण्याची, विचार करण्याची दृष्टी मात्र वेगळी आहे. फसवाफसवीचा डाव हे मुक्तछंदातील लघुकाव्य आहे.आणि चेटूक हे षडाक्षरी (षटकोळी) किंवा अक्षर
छंद काव्य आहे…
‘तुझ्या एका हातात ऊन आहे
एका हातात सावली आहे…’
–नियतीनं आयुष्यभर चकवलं. सुखदु:खाचे चटके दिले. चढउतार दाखवले. उन सावल्यांतून फिरवलं–असं हे विरोधाभासी आयुष्य जगताना, कवीला कुठेतरी श्रावणातल्या उनसावल्या जाणवतात. आणि हा फसवाफसवीचा खेळ मानवी जीवनात जसा आहे तसा निसर्गातही आहे याची समज मिळते. अगदी दहाच ओळीतला हा मानवी जीवनाचा निसर्गाशी असलेला संबंध श्रावणाकडे बघण्याची एक पलीकडची दृष्टी देतो. मानव आणि निसर्ग याची घातलेली ही सांगड मनात राहते.
‘श्रावणाची सर
फुलांच्या पायांनी
येते आणि जाते
चेटुक करुनी….’
—वास्तविक फुलं म्हणजे कोमलता. चेटूक या शब्दात उग्रता आहे. म्हणजे हे दोन्ही शब्द अर्थाने विरोधाभासी असले तरी कवितेच्या मानसिकतेत ते चपखल बसतात.
—मात्र सदानंद रेगे यांच्या फिनीक्सदुपाररस्ते, ब्रांकुशाचा पक्षी*, वगैरे कवितातून आढळणारे निखारे,ठिणग्या नागडेपणा ,काठिण्य हे ,चेटुक या कवितेत आढळत नाही. त्यामानाने ही कविता सौम्य आहे.
–पागोळ्यांची लव, ओलेतं मार्दव, हिरवी चाहुल, थेंबांचं पाउल, उन्हाचं लेकरु, छायेचं वासरु, हे शब्द एकेका घुंगरासारखे मनावर नाद उमटवतात.कवितेतला हा इंद्रधनु, रेशमी श्रावण मनावर तरंगत असतानाच, शेवटच्या कडव्यात मात्र ,कवीच्या एकाकीपणाशी येउन थबकतो.
‘आणिक मनाच्या
वळचणीपाशी
घुमे पारव्याची
जोडी सावळीशी…’
—हा रेशीम मुलायम श्रावण, कुठेतरी तुटलेल्या क्षणांपाशी येउन थांबतो.अन् आठवणींचे हे चेटुक कवीला वेदना देते असं वाटतं…
–त्यांचीच ‘अक्षरवेल’ या काव्यसंग्रहातील श्रावणावरचीच आणखी एक कविता सहज आठवते…
‘आला श्रावण श्रावण
गुच्छ रंगांचे घेउन
आता मेल्या मरणाला
पालवी फुटेल
गोठलेल्या आसवांना
पंख नवे येतील….’
–अशी आहे सदानंद रेगे यांची कविता!!—एकांगी किंवा एकात्म नसलेला ,विविधांगी,अनेक कोनी व्हीजन त्यांच्या कवितेत सातत्याने जाणवतो….विषय एक पण अंतरंग निराळे…
— ‘ सूर्याच्या नरडीवर उमटलेले सावल्यांचे व्रण…” अशा पंक्तीही जाणीवेला अंकुर फोडतात…आणि एक तीव्र कळ घेउनच, सदानंद रेगे यांची कविता जाणीवेच्या पलीकडे जात राहते….